30 Jan 2015

बर्डमॅन (A) रिव्ह्यू

असा नट असतो राजा...
---------------------------

कॅमेरासमोर उभं राहण्याची किंवा रंगभूमीवर वावरण्याची नशा फक्त नटमंडळीच जाणू शकतात. ही नशा आयुष्यभर उतरत नाही. ही नशा परकायाप्रवेशाची असते, तशीच ती त्यातून मिळणाऱ्या अफाट प्रसिद्धी अन् पैशाचीही असते. अर्थात कधी तरी या सर्व गोष्टींचा अटळ शेवट असतोच. आता आपण पूर्वीसारखे सुपरहिरो राहिलो नाही, ही भावना पचवणं अनेक नटांना जड जातं. त्यातून मग नशेच्या किंवा अमली पदार्थांच्या किंवा तत्सम कुठल्याही व्यसनाच्या आधीन होऊन त्यांचा करुण अंत होतो. असं असलं, तरी या नटांची कलाकार म्हणून जी एक अंगभूत मस्ती असते, रग असते ती औरच असते. ती काही केल्या मरत नाही. याच वास्तवाचा अद्भुत प्रत्यय देणारा सिनेमा म्हणून अलेजांद्रो गोंझालेझ इनारिटू या दिग्दर्शकाच्या ‘बर्डमॅन’ या नव्या कलाकृतीकडं पाहावं लागेल. बर्डमॅन अन् रीगन थॉमसनची भूमिका साकारणाऱ्या मायकेल कीटनची जबरदस्त अदाकारी (पडद्यावर अन् प्रत्यक्षातही) ‘असा नट असतो राजा...’ असे कौतुकोद्गार काढायला लावणारी ठरली आहे.


नव्वदच्या दशकात बर्डमॅन या सुपरहिरोची भूमिका करून तीन सुपरहिट सिनेमे देणारा रीगन आजच्या जमान्यात काहीसा आउटडेटेड झाला आहे. पण तो रेमंड कार्व्हरच्या ‘व्हॉट वुई टॉक अबाउट व्हेन वुई टॉक अबाउट लव्ह’ या गाजलेल्या कादंबरीचं नाट्यरूपांतर ब्रॉडवे थिएटरच्या रंगमंचावर आणून कलाजीवनात आणि एकूणच प्रसिद्धीच्या झोतात कमबॅक करण्याच्या विचारात आहे. वैयक्तिक आयुष्यातही गेल्या वीस वर्षांत त्याची कमाई ही गमावण्याकडंच जास्त आहे. पत्नीशी घटस्फोट झाला आहे आणि अमली पदार्थांच्या आहारी केलेली सॅम ही टीनएजर मुलगी त्याला, तो आजच्या काळाशी कसा सुसंगत नाही यावर त्याला खडे बोल सुनावते आहे. अशा स्थितीत या नाटकाच्या रिहर्सल सुरू आहेत. रंगीत तालमीचा प्रयोगही होऊ घातलाय. या नाटकात एक प्रमुख भूमिका करायला मिळावी, म्हणून तो एका नटाच्या डोक्यावर लाइट पडून तो जखमी होईल, अशी व्यवस्था करतो. एवढे होऊनही ती भूमिका त्याला मिळत नाहीच. सध्या रंगभूमीवर चलती असलेल्या माइक या नटाला पाचारण करण्यात येतं. त्याची मैत्रीण लेस्ली हेदेखील प्रथमच ब्रॉडवेवर काम करते आहे आणि तिच्यामुळंच माइक या नाटकात आला आहे. तो आल्यापासून रीगनचा त्याच्याशी खटका उडतो. माइक रीगनला अजिबात आदर देत नाही, उलट मी रंगभूमीचा राजा आहे आणि तू एका सामान्य मसालापटाचा एके काळचा नायक अशी त्याची खिल्ली उडवतो. रीगनची अस्वस्थता आणि नैराश्य वाढत असते. त्यातून त्यानंच एके काळी गाजवलेला बर्डमॅन त्याच्या कानात येऊन त्याला त्याच्या वैभवशाली भूतकाळाची हरघडी आठवण करून देत असतो आणि त्यातून त्याचं नैराश्य आणखी वाढवत असतो. त्यातून त्याची मुलगी आणि माइक जवळ आल्याचं तो पाहतो. माइक आणि लेस्लीसोबत त्याचा एक प्रवेश असतो आणि त्यात शेवटची रीगनचं पात्र स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या करीत असतं. एकूण तीनदा हा प्रवेश होतो. तिन्ही वेळेस प्रचंड गोंधळ होतात. प्रत्येक वेळी हा प्रवेश येण्यापूर्वी रीगनची अस्वस्थता टोकाला जात असते. तिसऱ्या वेळी रीगन खरोखरचं पिस्तूल घेऊन रंगमंचावर अवतरतो. नंतर काय होतं, हे प्रत्यक्ष पडद्यावरच पाहायला हवं.
मेक्सिकन दिग्दर्शक अलेजांद्रोनं अत्यंत कलात्मक रीतीनं हा विषय हाताळला आहे. नट नावाचं रसायन काय असतं, याचा पुरेपूर प्रत्यय त्याची ही कलाकृती आपल्याला देते. अत्यंत मनस्वी, स्वप्रतिमेच्या प्रेमात असलेले, हळवे, तेवढेच संतापी, क्षणात मूड बदलणारे असे कलावंत आपल्याला ठाऊक आहेत. आपले दिवस संपले आहेत, हे वास्तव स्वीकारू न शकणारे अनेक कलाकार आपण पाहतो. कीटननं साकारलेला रीगन अशाच मनोवृत्तीच्या कलाकारांचं प्रतिनिधित्व करतो. मात्र, अखेर त्याला त्याचा प्रेयस अन् श्रेयस कसं गवसतं, याची ही कथा आहे. रीगनच्या वैभवशाली पूर्वायुष्याचं प्रतीक म्हणून इथं बर्डमॅन हा सुपरहिरो योजण्यात दिग्दर्शकाचं कसब दिसतं. हा सुपरहिरो आपल्या नायकाच्या आयुष्यात काय बदल घडवून आणू शकतो, हे शेवटच्या एका दृश्यात रीगन हवेत उडून, टाइम्स स्क्वेअरची चक्कर मारतो त्यात दिग्दर्शकानं फार कल्पकपणे दाखवलं आहे. 

 याच टाइम्स स्क्वेअरमध्ये त्याला काही कारणामुळं अंगात फक्त अंडरवियर असताना धावावं लागतं, हे दृश्यही जमलं आहे. खरं सांगायचं तर या दोन्ही दृश्यांत रीगनची सगळी कहाणी आली आहे. या ब्रॉडवेवरच्या नाटकांचं भवितव्य जिच्या हाती असतं, अशा एका समीक्षिकेशी रीगनची झालेली शाब्दिक चकमक हाही या सिनेमाचा एक उत्कर्षबिंदू म्हणावा लागेल. अनेक दृश्यं स्पेशल इफेक्ट्सनं जोडून दिग्दर्शकानं जणू हा वन शॉट चित्रित केलेला सिनेमा आहे, असा निर्माण केलेला भासही पाहण्यासारखा!

मायकेल कीटननं बर्डमॅनची भूमिका अप्रतिमच केली आहे. करिअर संपलेल्या नटाचे सर्व भोग त्यानं आपल्या देहबोलीतून उभे केले आहेत. त्याला माइकच्या भूमिकेतील एडवर्ड नॉर्टन, सॅमच्या भूमिकेतील एमा स्टोन, लेस्लीच्या भूमिकेतील नाओमी वॅट्स यांनी चोख साथ दिली आहे.
या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारांमध्ये नऊ नामांकनं मिळाली आहेत. ती का, याचं उत्तर बर्डमॅन पाहूनच मिळतं. तेव्हा चुकवू नये असा हा चित्रपट आहे.



---
निर्माते : रिजन्सी एंटरप्रायजेस, वर्ल्डव्ह्यू एंटरटेन्मेंट
दिग्दर्शक : अलेजांद्रो गोंझालेझ इनारिटू
प्रमुख भूमिका : मायकेल कीटन, एडवर्ड नॉर्टन, एमा स्टोन, आंद्रेया राइसबरो, एमी रायन, झॅक गॅलिफियानाकिस, नाओमी वॅट्स
कालावधी : दोन तास दोन मिनिटे
दर्जा - ****
---

18 Jan 2015

लेखक ‘मरतो’ तेव्हा...



‘लेखक पेरुमल मुरुगन मरण पावला आहे. तो काही देव नाही, त्यामुळं पुन्हा अवतार वगैरे घेणार नाही. त्याचा पुनर्जन्मावरही विश्वास नाही. आता यापुढं तो पी. मुरुगन नावाचा सामान्य शिक्षक म्हणून जगेल...’ ही फेसबुक पोस्ट आहे तमिळनाडूतील वादग्रस्त लेखक पेरुमल मुरुगन यांची. गेल्या पंधरवड्यात तमिळनाडूतल्या साहित्य विश्वात खळबळ उडवून देणाऱ्या लहानशा घटनेची परिणती अशा रीतीनं एका लेखकाच्या ‘मृत्यू’त झाली. आजच्या अत्याधुनिक वेगवान संदेशांच्या जमान्यातही ही बातमी देशभर पसरायला आठ-दहा दिवस लागले. पण बातमी समजली अन् कुठं तरी आत तुटल्यासारखं झालं. शेवटी हा ‘माझिया जातीचा’ माणूस होता. लिहिणाऱ्या प्रत्येक माणसानं सूतक धरावं, असं काही तरी घडलं होतं. आपल्या स्वतंत्र देशात अनेक अपमृत्यू रोज घडतच असतात. त्यात या लेखकाची भर. त्याचं एवढं काय जीवाला लावून घ्यायचं? त्यांनी लिहिलेली एक ओळही आपण वाचलेली नाही. पण तरीही पोटात खड्डा पडला, डोळे ओलावले अन् डोकं सुन्न झालं. मुरुगन जात्यात आहेत आणि आपण सुपात, हीच भावना त्यामागं प्रबळपणे होती. उद्यापासून तुम्हाला आमच्या परवानगीशिवाय श्वास घेता येणार नाही, असा फतवाही कुणी काढेल, ही भीती होती. उद्या मला माझ्या मनासारखं लिहिता येईल की नाही, असं या देशात लिहिणाऱ्या प्रत्येक माणसाला वाटावं एवढा हा मृत्यू धक्कादायक होता; आहे.

काय कारण होतं मुरुगन यांच्या या अकाली मरणामागं? खरं तर फार वेगळं, अपवादात्मक कारण होतं असं नाही. तुम्ही धर्माचा, आपल्या संस्कृतीचा अपमान केला आहे; आमच्या भावना दुखावल्या आहेत, असं त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचं म्हणणं होतं. संत तुकाराम महाराजांपासून ते सलमान रश्दीपर्यंत प्रत्येक कवीच्या, लेखकाच्या प्राक्तनात हे भोग आलेच होते. मुरुगन हेही त्याला अपवाद ठरले नाहीत. तमिळनाडूतील नामक्कल जिल्ह्यातील तिरुचेंगोडू या गावचे रहिवासी असलेले मुरुगन पेशानं प्राध्यापक आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांनी ‘मधोरुबागन’ (अर्धनारीश्वर) या नावाची एक कादंबरी लिहिली. तेव्हा तमिळनाडूतील समीक्षकांनी खरं तर या कादंबरीचं चांगलं स्वागत केलं होतं. पण नुकताच या कादंबरीचा ‘वन पार्ट वुमन’ या नावाचा अनुवाद प्रसिद्ध झाला आणि सगळं बिघडलं. तमिळनाडूच्या पश्चिम भागात प्रबळ असलेल्या वेल्लाळ गौंडूर या जातीतील काही जणांनी ही कादंबरी त्या जातीचा आणि एकूण हिंदू धर्माचा अपमान करणारी आहे, असा प्रचार सुरू केला आणि मुरुगन अडचणीत सापडले. मुरुगन यांचा अपराध मोठाच होता. स्त्री-पुरुष संबंधांतील रूढ रीती-रिवाजांना फाटे देणाऱ्या आणि अब्रह्मण्यम या सदरात मोडणाऱ्या अनेक गोष्टी त्यांच्या या कादंबरीत होत्या. मुळात हा अर्धनारीश्वर म्हणजे मुरुगन यांच्याच गावाचा देव. स्वतः मुरुगनही वेल्लाळ गौंडूर याच जातीचे. पण या जातीत काही वर्षांपूर्वी रूढ असलेल्या एका विलक्षण परंपरेचा उल्लेख त्यांनी आपल्या कादंबरीत केला आणि सगळा गोंधळ झाला. ही परंपरा होती काहीशी नियोग विधीची. ज्या जोडप्याला अपत्यप्राप्ती होत नसे, अशी जोडपी अर्धनारीश्वराच्या यात्रेत चालणाऱ्या एका उत्सवात येत. तिथं अशी स्त्री आपल्या आवडीच्या पुरुषासोबत संग करू शके आणि त्यातून ‘देवानं दिलेलं मूल’ जन्माला घालू शकत असे. या रूढीच्या पार्श्वभूमीवर मुरुगन यांनी आपल्या कादंबरीत एका विनापत्य जोडप्याची कहाणी रंगवली. अशा रूढी-परंपरा आपल्याकडं पूर्वीच्या काळी सर्रास प्रचलित होत्या. तेव्हाच्या समाजानं कदाचित नाइलाजानं, कदाचित सोय म्हणून त्या स्वीकारल्या असतील. तेव्हाही हा सर्व प्रकार ‘झाकली मूठ’ या न्यायानंच चालत असणार. अशा पद्धती समाजात रुढ होण्यामागं असलेल्या दाहक वास्तवाचा, स्त्रीविषयीचा भेदभावाचा कानोसा घेण्याची प्रेरणा लेखक म्हणून मुरुगन यांना झाली, यात चूक काहीच नव्हती. चूक एकच होती, की त्यांना स्त्री-पुरुष संबंधांविषयी आपल्या समाजानं वर्षानुवर्षं जोपासलेल्या दांभिकतेचा अंदाज आला नाही. स्त्री-पुरुषांच्या लैंगिक संबंधांविषयी या समाजाचे प्रचलित नीतिनियम आणि बंधनं (आणि ते तोडणाऱ्यांच्या शिक्षा) एवढे स्पष्ट आहेत, की त्याला छेद देणारं कुणी काहीही लिहिलं-बोललं तर ते ब्रह्महत्येचंच पातक मानलं जातं. मुरुगन यांची ही मोठीच चूक झाली. ही कादंबरी लिहून त्यांनी कुठल्या विनापत्य स्त्रीची वेदना मांडली, याला फारशी किंमत नसून, तिनं कुठल्याशा रात्री पतीखेरीजच्या अन्य पुरुषासोबत शय्यासोबत केली यालाच सर्वाधिक महत्त्व आहे, हे त्यांच्या लक्षात कसं आलं नाही? काय वाट्टेल ते झालं, तरी लेखकानं आपल्या गावाचा, आपल्या देवाचा, आपल्या जातीचा आणि आपल्या धर्माचा अपमान करायचा नसतो. (खरं तर धार्मिक संवेदनशील मुद्द्यांची एक यादीच सरकारनं जाहीर करायला हवी. त्यातील वर्ज्य मुद्द्यांवर लिहिणाऱ्यांना मग सार्वजनिक चौकात फटक्यांसारखी शिक्षाही पुनरुज्जीवित करायला हवी.) तमिळनाडूत हेच झालं. आता ई. व्ही. पेरियार रामस्वामींसारख्या मूर्तिभंजक, आधुनिक द्राविडी अस्मितेच्या जनकाच्या भूमीत लेखकाला दिवसाढवळ्या मरण पत्करावं लागतं, याचंही आश्चर्य वाटायला नको खरं तर. आपल्याकडं महाराष्ट्रात पुरोगामित्वाच्या वारशाचा सात-बारा पिढीजात आपल्याच पिताश्रींच्या नावावर आहे, अशा थाटात काही राजकीय पक्ष वावरत असतात. तमिळनाडूत करुणानिधींचा द्रमुक हा असाच एक पुरोगामी पक्ष. तोही या प्रकरणात मूग गिळून गप्प बसला. वास्तविक स्वतः करुणानिधी हे (सिनेमाचे का होईना, पण) मूळ लेखक. पण त्यांनी डोळ्यांवर राजकीय फायद्याचा जाडजूड गॉगल चढविला असल्यानं; आणि तसंही वयाच्या नव्वदीत त्यांना आपण एके काळी लिहीत वगैरे होतो याचं विस्मरण होणं शक्य असल्यानं त्यांच्या पक्षाकडून काही झालं नाही. दुसरीकडं जयललिता यांच्या अण्णा द्रमुकनंही सोयिस्कर मौन बाळगलं आहे. तेव्हा नमक्कल जिल्ह्यातील गौंडूर जातीच्या लोकांना आणि तेथील स्थानिक हिंदू संघटनांना पेरुमल यांच्या विरोधात रान उठवायला मोकळीकच मिळाली. गेल्या २७ डिसेंबर रोजी सुरू झालेलं हे आंदोलन एवढं तीव्र झालं, की १३ जानेवारीला नामक्कल जिल्हा प्रशासनानं एक बैठक बोलावली. तिथं हजर होण्याचं समन्स मिळालेल्या मुरुगनना, या बैठकीत सर्वांची सपशेल लेखी माफी मागावी लागली. या पुस्तकाच्या न खपलेल्या प्रतीही यापुढं विकणार नाही, असं त्यांना कबूल करावं लागलं. शिवाय त्या प्रतींचा खर्च प्रकाशकाला भरून देण्याचंही मान्य करावं लागलं. मुरुगन एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी गेल्या १७ वर्षांपासून त्यांची पुस्तकं प्रकाशित करीत असलेल्या सर्व प्रकाशकांना आपली आधीची पुस्तकंही यापुढं विकू नका, असं सांगितलं आहे. त्यांना त्याची भरपाई देऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. वाचकांनी त्यांच्या घरी असलेल्या आपल्या पुस्तकांच्या प्रती जाळून नष्ट कराव्यात; त्यांनाही आपण भरपाई देऊ, असं आवाहन मुरुगन यांनी केलं आहे. या सर्वच प्रकारामुळं मुरुगन किती अस्वस्थ, किती व्यथित झाले आहेत याची कल्पना येऊ शकेल.

मुरुगन नावाचा लेखक अकाली मेला, याची ही गोष्ट. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची गोष्टही आपल्याकडं ‘अटी लागू’ याच नियमाखाली मिळते, हेच अधोरेखित करणारी ही गोष्ट. पुढं काय वाढून ठेवलं आहे, याची सगळ्याच लेखकूंना कडक जाणीव करून देणारी. आपल्याला भयकंपित करणारी! लेखक गेल्याचं दुःख तर आहेच, पण लेखकांचा काळ कसा सोकावला आहे, याची वेदना जास्त आहे. एखाद्या देशात जेव्हा लेखकाला अशी ‘आत्महत्या’ करावीशी वाटते, तेव्हा त्या देशाच्या ललाटी भविष्यात काय लिहिलेलं असतं, हे इथं लिहायला नकोच!
----
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, १८ जानेवारी २०१५)
-----

4 Jan 2015

लोकमान्य - एक युगपुरुष



टिळकपर्वाचा मर्मभेदी वेध
------------------------------



लोकमान्य - एक युगपुरुषहा ओम राऊत दिग्दर्शित नवा मराठी सिनेमा पाहताना अंगात एक वेगळंच स्फुरण चढतं. देशप्रेमाची प्रखर भावना मनात प्रज्वलित होते आणि आपल्या गौरवशाली इतिहासाचं आपल्याला दिवसेंदिवस होत असलेलं विस्मरण पाहून मन खिन्नही होतं. लोकमान्य टिळक या नावाची जादू त्यांच्या मृत्यूनंतर शंभर वर्षांनंतरही कायम आहे, हे पाहून कुठं तरी बरंही वाटतं. त्याच वेळी सिनेमा पाहून जर एवढी चेतना येते, तर प्रत्यक्ष टिळकांना पाहून-ऐकून काय झालं असतं, असं वाटून जातं. एवढे लोक त्यांच्या मागं का गेले असावेत, याचंही उत्तर चटकन मिळून जातं.
लोकमान्यांवर २०१५ मध्ये सिनेमा तयार करताना ओम राऊतच्या मनात काय उद्देश असावा, हे सुरुवातीच्या नाना पाटेकरांच्या निवेदनातच स्पष्ट होतं. टिळक दिवसेंदिवस संदर्भहीन होत चालले आहेत की काय, असा प्रश्न दिग्दर्शकाला पडला असावा. त्यात काही तथ्य नाही, असंही नाही. मात्र, तुलनेनं अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेल्या अशा लोकविलक्षण व्यक्तिमत्त्वावर सिनेमा काढणं ही अजिबात सोपी गोष्ट नव्हती. टिळकांच्या आवाजाचं रेकॉर्डिंग सापडलं, या अगदी अलीकडच्या घटनेचा संदर्भ घेऊन ओमनं लोकमान्यांची ही कथा पुन्हा अगदी भक्तिभावानं पडद्यावर आणली आहे. अर्थात असं करताना त्यानं एक फार चांगली गोष्ट केली आहे. त्यानं केवळ टिळकांची गाथा मांडलेली नाही, तर आजच्या काळातील एक व्यक्तिरेखेची मांडणी करून दोन्ही काळांचा संदर्भ जोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. आजच्या मराठी सिनेमाचा प्रेक्षक लक्षात घेऊन केलेली ही मांडणी हुकमी तर आहेच, पण ती लोकमान्यांची गाथा अधिक प्रभावीपणे ठसविण्यात मदत करते.
लोकमान्य टिळकांची प्रखर राष्ट्रभक्ती, स्वराज्यप्राप्तीसाठी त्यांनी स्वीकारलेला जहाल मार्ग, सामाजिक सुधारणेच्या आधी स्वातंत्र्य मिळविण्याचा त्यांचा दुर्दम्य आग्रह, इतरांवर प्रभाव टाकणारं अत्यंत ओजस्वी व्यक्तिमत्त्व, समाजातील सर्व थरांतील लोकांना बरोबर घेऊन जाण्याची अंगभूत वृत्ती, देशभरातील स्वातंत्र्यलढ्याचं त्यांच्याकडं चालत आलेलं नेतृत्व या सगळ्या गुणांचं दर्शन सव्वादोन-अडीच तासांच्या सिनेमात तेवढ्याच ताकदीनं घडवणं हे सोपं आव्हान नव्हतं. पण ओम राऊतनं प्रथम पदार्पणाचा सिनेमा असूनही ते आव्हान यशस्वीपणे पेललं आहे, हे सांगावंसं वाटतं.
लोकमान्य टिळकांच्या कर्तृत्वाचा काळ आता शंभरहून अधिक वर्षं जुना. नाही म्हटलं तरी आत्ताच्या पिढीला तो फारसा ज्ञात नाही. शाळेत किंवा कॉलेजात शिकवल्या जाणाऱ्या धड्यांतूनच थोडे फार टिळक माहिती. त्यातल्या त्यात ती शेंगांच्या टरफलाची गोष्ट, किंवा कॉलेजमध्ये असताना व्यायामासाठी त्यांनी दिलेलं एक पूर्ण वर्ष, केसरीतील त्यांचे गाजलेले अग्रलेख, पुण्यातील प्लेगची साथ, रँडच्या हत्येचं प्रकरण, मंडालेतील तुरुंगवास आणि तिथं त्यांनी लिहिलेलं गीतारहस्य एवढ्या मोजक्याच गोष्टी सर्वांना माहिती. अशा स्थितीत टिळकांचं संपूर्ण जीवन केवळ एक बायोएपिक म्हणून मांडणं कदाचित आत्ताच्या प्रेक्षकांसाठी कंटाळवाणं झालं असतं. मात्र, दिग्दर्शकाने टिळकांची ही कथा आजच्या काळातील पत्रकार मकरंद याच्या जगण्याशी जोडून काळाचा दुवा बेमालूमपणे सांधला आहे. त्यामुळं सिनेमात एका फ्रेममध्ये शंभर वर्षांपूर्वीचा काळ, तर पुढच्याच फ्रेममध्ये आजच्या काळातील मकरंदचं वृत्तपत्राचं ऑफिस किंवा एखादा मॉल वगैरे असं दृश्य दिसतं. पटकथेची अशी रचना आणि त्यामुळं हवे तेव्हा दोन्ही काळांत भ्रमंती करण्याचं स्वातंत्र्य यात या सिनेमाचं निम्मं यश सामावलेलं आहे. या रचनेमुळं आपण प्रेक्षकही मकरंदच्याच नजरेतून टिळकांकडं पाहू लागतो आणि एका अर्थानं दिग्दर्शकाला ज्या परिघातून किंवा परिप्रेक्ष्यातून टिळक दाखवायचे आहेत, तेवढ्याच मर्यादेत ते आपण पाहत राहतो. यामुळं टिळकांचं नायकत्व, लोकमान्यत्व अधिक ठसण्यात मदत होते. आपण एक फार मोठी व्यक्ती पाहत आहोत, ही धारणा आधीच प्रेक्षकांची तयार झालेली असते. त्यामुळं टिळकांची व्यक्तिरेखा लार्जर दॅन लाइफ होण्यास पोषक वातावरण निर्माण होतं. अशा महान व्यक्तित्वांवरील बायोएपिक दाखवताना त्या मोठ्या माणसांचं माणूस असणंही दाखवावं, असं अपेक्षित असतं. टिळकांच्या गाथेत असे एक-दोन प्रसंग आहेत, मात्र ते संख्येनं फार नाहीत. त्यामुळं त्या बाजूनं विचार करता हे सिनेमाचं थिटेपण वाटतं. याशिवाय टिळकांच्या काळातील अन्य जी महान व्यक्तिमत्त्वं होती, उदा. विवेकानंद किंवा महात्मा गांधी... यांचं या सिनेमातलं दर्शन बेतास बात ठरलं आहे. पण ही काही फार मोठी त्रुटी आहे अशातला भाग नाही. सिनेमा पाहण्याच्या ओघात हे फार जाणवतही नाही. टिळकांचं मोठेपण सदैव ठसत राहतं. टिळक प्रत्यक्षात कसे बोलत होते, हे आपल्याला माहिती नाही. मात्र, सिनेमात दिग्दर्शकानं त्यांना काहीशी वरची पट्टी दिली आहे. टिळक व्यक्ती म्हणून सिंहासारखे होते आणि त्यांचे अग्रलेख सिंहगर्जनेसारखेच असत, याचा अर्थ त्यांनी प्रत्यक्षात बोलतानाही शिरा ताणूनच बोलावं असं काही नाही. पण या सिनेमात थोडं ते तसं झाल्याचं जाणवतं. 

टिळक-आगरकर यांची मैत्री सिनेमाच्या पूर्वार्धात चांगली आलीय. मात्र, मध्येच आगरकरांचा धागा तुटलाय. कधी कधी मकरंद आणि त्याची होणारी पत्नी समीरा यांची गोष्ट काहीशी लांबते. अर्थात हेही प्रसंग फार नाहीत. सिनेमाचा एकूण जो परिणाम आहे, तो पुष्कळ सकारात्मकच आहे.
सुबोध भावेनं ‘बालगंधर्व’नंतर पुन्हा एक आव्हानात्मक भूमिका साकारली आहे आणि त्यानं टिळकांच्या या व्यक्तिरेखेला पुरेपूर न्याय दिला आहे, यात शंकाच नाही. देहबोली, नजर, आवाजाचे चढ-उतार यातून त्यानं लोकमान्यांसारखी असाधारण व्यक्तिरेखा ताकदीनं उभी केली आहे. चिन्मय मांडलेकरनंही मकरंदच्या भूमिकेत चांगले रंग भरले आहेत. लोकमान्यांच्या गाथेला हवा असलेला काँट्रास्ट मकरंदच्या पात्रानं अन् एकूण त्या पर्यावरणानं चांगला उपलब्ध करून दिलाय. प्रिया बापटच्या वाट्याला छोटीशी भूमिका आली आहे.
सिनेमाची वेषभूषा आणि कला-दिग्दर्शन अव्वल दर्जाचं. फक्त एक गोष्ट खटकते. टिळकांच्या वाड्याला ‘केसरीवाडा’ असं नाव त्या काळात नव्हतं. तेव्हा तो गायकवाड वाडा म्हणूनच ओळखला जायचा. सिनेमात मात्र वाड्यावर ‘केसरीवाडा’ अशी पाटी दिसते. ही ढोबळ चूक टाळायला हवी होती. असो.
अर्थात, टिळकांवरचा असा भव्य चित्रपट काढण्याचं आव्हान पेलणारे ओम राऊत व निर्मात्या नीना राऊत दोघंही अभिनंदनास पात्र आहेत, यात शंका नाही. हा सिनेमा सर्वांनी एकदा तरी नक्की पाहावाच.
--
दर्जा - साडेतीन
---