26 Jun 2016

मटा वर्धापनदिन मराठी सिनेमा लेख

‘सांगत्ये ऐका’ ते ‘सैराट’...
----------------------------------

मराठी सिनेमाच्या इतिहासात सैराटया चित्रपटानं आता अढळ स्थान मिळवलंय. लवकरच हा सिनेमा शंभर कोटी रुपये उत्पन्नाचं रेकॉर्ड गाठणार अशी चिन्हं आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच मराठी सिनेमा ठरेल. मराठी सिनेमानं मारलेली ही मजल मराठी माणसांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे. या सिनेमाची केवळ भारतात नव्हे, तर जगभर चर्चा झाली. मराठी सिनेमाचा बोलबाला गेल्या काही वर्षांत वाढला आहेच. तो या निमित्तानं पुन्हा अधोरेखित झाला. यानिमित्तानंमटा’च्या स्थापनेपासून ते आतापर्यंतचा मराठी सिनेमाचा प्रवास जाणून घेणं रंजक ठरेल. 
मुंबईत महाराष्ट्र टाइम्स सुरू झाला १८ जून १९६२ ला. त्याआधी तीन वर्षांपूर्वी म्हणजे १९५९ मध्ये पडद्यावर आलेला सांगत्ये ऐका’ हा चित्रपट असाच सैराट धुमाकूळ घालत होता. अनंत माने दिग्दर्शित हा चित्रपट आणि त्यातलं जयश्री गडकरवर चित्रित झालेलं बुगडी माझी सांडली गंहे आशा भोसलेंनी गायलेलं गाणं सर्वतोमुखी झालं होतं. पुण्याला विजयानंद टॉकीजमध्ये या सिनेमानं तब्बल १३१ आठवडे मुक्काम ठोकला होता. त्या काळात मराठी चित्रपटसृष्टी प्रामुख्यानं कोल्हापुरातच होती. पुण्यात प्रभात स्टुडिओ बंद पडल्यानंतर कोल्हापूर हेच मराठी चित्रपटांचं माहेरघर झालं होतं. बाकी इतर काही सिनेमे मुंबईत बनत. तेव्हा भालजी पेंढारकर, राजा परांजपे, अनंत माने हे दिग्दर्शक जोरात होते. ‘साधी माणसंआणि ‘जगाच्या पाठीवर’ हे दोन्ही सिनेमे १९६५चे. अत्यंत गाजलेले. राज्य सरकारनं मराठी चित्रपटांसाठी पुरस्कार सुरू केले ते १९६३ मध्ये. प्रपंच हा सिनेमा तेव्हा पहिला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा ठरला होता. व्ही. शांतारामही चित्रनिर्मितीत अग्रेसर होते. त्यांनी १९७२ मध्ये पिंजरासिनेमा केला. 
हा सिनेमा मराठीतला एक माइलस्टोन सिनेमा मानला जातो. डॉ. श्रीराम लागूंनी साकारलेली मास्तरांची अजरामर भूमिका, राम कदमांचं बहारदार संगीत, उषा मंगेशकरांनी गायलेल्या एक से फर्ड्या लावण्या आणि अनंत मानेंची भक्कम पटकथा या जोरावर पिंजराजबरदस्त हिट ठरला. पिंजराच्या यशासोबतच आणखी एक नाव मराठी चित्रपटसृष्टीत झळकू लागलं होतं आणि ते म्हणजे दादा कोंडके. दादांचा सोंगाड्याहा पहिला चित्रपट १९७० मध्ये प्रदर्शित झाला आणि तो प्रचंड गाजला. त्याआधी विच्छा माझी पुरी करासारख्या वगनाट्यांतून दादा मराठी रसिकांना परिचित होते. मात्र, ‘सोंगाड्याच्या यशानंतर दादांना राजमार्ग सापडला आणि त्यांनी ओळीनं नऊ रौप्यमहोत्सवी चित्रपट दिले. पुढचं ऐंशीचं पूर्ण दशक दादा मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य करीत होते. 
पांडू हवालदार, एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, तुमचं-आमचं जमलं, राम राम गंगाराम, ह्योच नवरा पाहिजे, बोट लावीन तिथं गुदगुल्या असे एक से एक हिट सिनेमे दादांनी दिले. पुढं दादांच्या सिनेमांचा दर्जा घसरला. ते द्व्यर्थी संवादांवरच अवलंबून राहू लागले. या जोडीला टिपिकल शहरी, मध्यमवर्गीय प्रेक्षकांना भावणारे सिनेमे तयार होतच होते. त्यात मुंबईचा जावई, अवघाचि संसार, अपराध, मानिनी, अरे संसार संसार, धाकटी जाऊ, वहिनीच्या बांगड्या, मुंबईचा फौजदार, देवता अशा सिनेमांचा समावेश होता. अरुण सरनाईक, कुलदीप पवार, रवींद्र महाजनी, अशोक सराफ हे नायक जोरात होते. नायिकांमध्ये जयश्री गडकर, रंजना, पद्मा चव्हाण, उषा चव्हाण, उषा नाईक, आशा काळे ते नव्यानं आलेली अलका कुबल या सगळ्या फॉर्मात होत्या. ऐंशीच्या दशकात दादांप्रमाणेच सुषमा शिरोमणीनं एकहाती किल्ला लढविला. त्यांनी काढलेले भिंगरी, फटाकडी, मोसंबी-नारंगी, गुलछडी आदी सिनेमेही जोरात चालले. पुढं १९८० ते १९८४ हा काळ हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणंच मराठीलाही वाईट गेला. याचं कारण व्हीसीआरचा लागलेला शोध आणि गावोगावी बोकाळेली व्हिडिओ पार्लर. 
यामुळं सिनेमांचा धंदा बसायला लागला. अर्थात याच काळात डॉ. जब्बार पटेल, अमोल पालेकर यांनी मराठी चित्रपटांची वेगळी वाट तोलून धरली होती. सामना, सिंहासन, जैत रे जैत आणि उंबरठा हे डॉ. पटेलांचे चारही चित्रपट खूप हिट झाले आणि चर्चेत राहिले. अमोल पालेकरांनी आक्रीत, तर डॉ. लागूंनी झाकोळ या चित्रपटाची निर्मिती याच काळात केली. शांतारामबापूही चानी’सारखा वेगळा सिनेमा देत होते. साधारण १९८२-८३ च्या सुमारास आलेले गोंधळात गोंधळ, लेक चालली सासरला हे सिनेमे चांगले चालले होते. राजदत्त आणि कमलाकर तोरणे हे दिग्दर्शक तेव्हा जोरात होते.
व्हिडिओ पार्लरच्या गर्तेत सापडलेल्या मराठी सिनेमाला परत ऊर्जितावस्था मिळवून दिली ती दोन सिनेमांनी. हे दोन्ही सिनेमे १९८४ मध्ये झळकले. एक होता महेश कोठारेचा धूमधडाका’ (हा शशी कपूरच्या प्यार किये जाचा रिमेक होता) आणि दुसरा होता सचिनचा ‘नवरी मिळे नवऱ्याला...’ हे दोन्ही चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत माइलस्टोन ठरले. पुढं या दोघांनीही अनेक हिट चित्रपट दिले. दोघांचेही सिनेमे एकाच वेळी येत आणि दोन्ही व्यवसाय करीत. 
सचिनचे सिनेमे शहरी तोंडवळा असलेले असत आणि महेशचे ग्रामीण. गंमत-जंमत, दे दणादण, अशी ही बनवाबनवी, थरथराट, एकापेक्षा एक, धडाकेबाज, आमच्यासारखे आम्हीच, झपाटलेला असे अनेक हिट चित्रपट या काळात आले. आत्मविश्वास’सारखा गंभीर सिनेमाही सचिननं दिला. पुढं कुंकू’ सिनेमा केल्यानंतर सचिननं दीर्घकाळ मराठी चित्रनिर्मितीतून संन्यास घेतला. (पुढं २००५ मध्ये नवरा माझा नवसाचाद्वारे त्यानं पुन्हा मराठी सिनेमांकडं लक्ष वळवलं.) लक्ष्मीकांत बेर्डे हा महेशचा हुकमी एक्का होता, तर अशोक सराफ हा सचिनचा. पुढची पाच-सात वर्षं या दोघांनीही मराठी चित्रपटसृष्टीवर अनिर्बंध राज्य केलं. केवळ लक्ष्या आणि अशोकमामांना घेऊन अनेक विनोदी चित्रपट तयार झाले. पण या इनोदीचित्रपटांमुळं मराठी चित्रपटसृष्टीचं दीर्घकाळ नुकसानच झालं. प्रेक्षकांनी मराठी सिनेमांकडं पाठ फिरविली. 
याच काळात आणखी एक तरुण निर्माती-दिग्दर्शिका धाडसानं मराठी चित्रपटांची निर्मिती करीत होती. स्मिता तळवलकर तिचं नाव. कळत-नकळतपासून ते तू तिथं मी’पर्यंत अनेक चित्रपट स्मितानं पुढील दशकभरात दिले आणि मरत्या मराठी इंडस्ट्रीमध्ये धुगधुगी कायम ठेवली. नव्वदच्या दशकात पुण्यातून सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयीनंही हेच केलं. ‘दोघीपासून ते वास्तुपुरुषपर्यंत अनेक उत्तमोत्तम सिनेमे त्यांनी दिले. 
याच काळात सातत्यानं दर्जेदार चित्रपटनिर्मिती करणारं नाव म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी. त्यांच्या बिनधास्त’ या पहिल्याच सस्पेन्स थ्रिलर चित्रपटानं खळबळ उडवून दिली. यातल्या सर्व प्रमुख भूमिका महिलांनीच केल्या होत्या, हे विशेष. पाठोपाठ भेट, कायद्याचं बोला, कदाचित, संत तुकाराम, आजचा दिवस माझा असे अनेक उत्तमोत्तम सिनेमे त्यांनी या काळात दिले. याच काळातलं आणखी एक नाव म्हणजे गजेंद्र अहिरे. नॉट ओन्ली मिसेस राऊत’ या चित्रपटापासून लक्ष वेधून घेणाऱ्या गजेंद्रनं त्यानंतर अनेक सिनेमे केले. सातत्यानं चित्रपट देण्याची त्याची हातोटी अचंबित करणारी आहे. शिवाय एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पेलून तो सिनेमे करीत असतो. सिनेमाच्या प्रती विलक्षण पॅशन असल्याशिवाय हे शक्य नाही.
एकविसावं शतक उजाडलं आणि पाठोपाठ मल्टिप्लेक्सचंही युग सुरू झालं. मल्टिप्लेक्समुळं सिनेमाच्या व्यवसायाचं परिमाणच बदलून गेलं. सिनेमानिर्मितीचं प्रमाण वाढलं. व्यावसायिकता वाढली.
नंतर २००४ मध्ये श्वास’ आला आणि सगळंच चित्र बदललं. श्वास’नंतर मराठी चित्रपटसृष्टीतलं सगळं चित्रच बदललं. अनेक दर्जेदार चित्रपट आले. तरुण मुलं दिग्दर्शनात आली. सचिन कुंडलकर, उमेश कुलकर्णी, सतीश राजवाडे, गिरीश मोहिते, सतीश मन्वर, मंगेश हाडवळे, सुजय डहाके यांनी खूप चांगले सिनेमे देण्याचा प्रयत्न केला. महेश मांजरेकर यांनी मराठी चित्रपटनिर्मितीत भव्यता आणली. ‘झी टॉकीज’नं मार्केटिंगचं प्रभावी तंत्र आणलं. जोगवा, नटरंग, बालगंधर्व, लोकमान्य टिळक, टाइमपास, शाळा ते अगदी अलीकडचा नटसम्राट असे किती तरी सिनेमे जोरात चालले. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’सारखा सिनेमा सर्वदूर पोचला. रितेश देशमुखनं मराठीत पदार्पण करून काढलेला लय भारीही असाच कानाकोपऱ्यात पोचला आणि हिट झाला. ग्रामीण भागातून पुढं आलेले भाऊराव कऱ्हाडे, नागराज मंजुळे हे दिग्दर्शक जोमानं नवनव्या कलाकृती सादर करू लागले. त्यातून मराठी सिनेमाचा चेहरा बदलत गेला. नवे प्रयोग होत आहेत. आशयदृष्ट्या मराठी सिनेमा समृद्ध होताच; आता तो तंत्रदृष्ट्याही समृद्ध झाला आहे. बजेटही वाढलं आहे. आता मराठी चित्रपट नव्या वळणावर आहे. यापुढंही चांगले चांगले सिनेमे येत राहतील आणि मराठी चित्रपटसृष्टी नव्या उंचीवर जाईल, अशी खात्री वाटते.


---
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, मुंबई आवृत्ती, २५ जून २०१६)
----

24 Jun 2016

एक अलबेला - रिव्ह्यू




नाम बडे और दर्शन भी...
------------------------------

मा. भगवान म्हटलं, की अलबेला आणि अलबेला म्हटलं की मा. भगवान हीच नावं आठवतात, एवढं या नावांचं अद्वैत झालंय. भगवान पालव नावाच्या मराठमोळ्या माणसानं चाळीसच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत अक्षरशः थैमान घातलं. भगवान यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं नृत्य. कमरेखालचा भाग अजिबात न हलवता, केवळ हात आणि कमरेवरील भाग यांचा वापर करून ते ज्या पद्धतीनं नृत्य करीत असत, ती शैली लोकांनी डोक्यावर घेतली. भगवान स्टाइल डान्स या नावानंच तो नृत्यप्रकार ओळखला जाऊ लागला. अशा या अवलिया कलाकारावर 'एक अलबेला' हा मराठी चित्रपट आला आहे. मराठी कलाकारावर असा बायोस्कोपिक पद्धतीनं आलेला हा दुसरा मराठी सिनेमा. (आधीचा फाळकेंवरचा 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'.) शेखर सरतांडेल या दिग्दर्शकानं अत्यंत मेहनतीनं आणि प्रामाणिकपणे हा प्रयत्न आपल्यासमोर मांडला आहे. 
'एक अलबेला'मध्ये एक वाक्य आहे. भगवान यांना काही कारणानं नृत्य कलाकार मिळत नसतात. तेव्हा ते फाइट सीन करणाऱ्या कलाकारांकडून नृत्य करून घेतात. त्या वेळी ते म्हणतात, की प्रत्येकाच्या शरीरात नाचाची लय असते. तुम्ही ती फक्त ओळखायला हवी. हे वाक्य म्हणजे या सिनेमाचं भरतवाक्य म्हणायला हरकत नाही. कारण नंतर सिनेमाचा जवळपास संपूर्ण भाग भगवान तयार करीत असलेला 'अलबेला' हा सिनेमा आणि त्यातील गाणी व नृत्यं यांनीच व्यापला आहे. भगवान यांचा मूळ सिनेमा पाहताना आणि त्यातल्या 'शोला जो भडके'सारख्या गाण्यावर गीताबाली आणि भगवान यांचा (आणि त्यांच्या सहनृत्यकलाकारांचा) डान्स पाहताना आपणही नकळत ताल धरतो आणि नाचू लागतो. शेखर सरतांडेल यांनी या गाण्यांचं 'फ्रेम टु फ्रेम' रिक्रिएशन केलं आहे. ते पाहतानाही आपण तसाच ताल धरतो आणि (मनातल्या मनात का होईना) ते झिंग आणणारं नृत्य करू लागतो आणि हेच मला वाटतं, या सिनेमाचं यश आहे.
सरतांडेल यांनी सिनेमाचे सरळ सरळ दोन भाग केले आहेत. पहिला भाग भगवान यांचं सुरुवातीचं आयुष्य दाखविण्यात खर्च झाला आहे. त्यात अगदी १९३० च्या आंदोलनात भगवान यांनी शिवडीच्या मिठागारात केलेला 'सत्याग्रह' ते 'अलबेला'च्या निर्मितीपर्यंतचा प्रवास आला आहे. भगवान यांची कौटुंबिक परिस्थिती, त्यांना घर सोडावं लागणं, पानाच्या दुकानात काम करणं, त्या मोहल्ल्यातील शाहीन या तरुणीशी जुळलेले त्यांचे नाजूक भावबंध, मग तिचा विरह, त्यानंतर त्यांचं कुस्ती खेळायला जाणं, तिथल्या मित्रासोबत स्टुडिओत जाणं, मग अचानक सिनेमात काम करायची मिळालेली संधी, नंतर अॅक्शन हिरो म्हणून बी ग्रेड सिनेमांमध्ये त्यांनी कमावलेलं नाव आदी सर्व भाग तपशिलात येतो. सिनेमाचं संकलन झक्कास असल्यानं तो वेगानं पुढं सरकतो. कुठलंही दृश्य अकारण ताणलेलं नाही. अनेकदा तर नॅरेशनमधूनच गोष्ट पुढं जाते. प्रेक्षक सिनेमात गुंतून राहण्यासाठी हे असं वेगवान सादरीकरण पथ्यावर पडणारं आहे.
भगवान यांच्या आयुष्यात सी. रामचंद्र यांचं महत्त्वाचं स्थान होतं. त्यांची आणि भगवान यांची मैत्रीही सिनेमात दिसते. 'अलबेला'च्या यशात सी. रामचंद्र यांच्या संगीताचा आणि त्यांनी दिलेल्या तब्बल ११ गाण्यांचा मोठा वाटा आहे. 'भोली सुरत दिल के खोटे', 'शोला जो भडके', 'शाम ढले खिडकी तले तुम सिटी बजाना छोड दो' यासारखी सुपरहिट गाणी किंवा 'धीरे से आजा री अखियन में, निंदिया आजा री आजा'सारखी आजही सर्वश्रेष्ठ मानली जाणारी अंगाई ही सर्व अण्णा चितळकरांची कमाल होती. त्यांचा आणि लता मंगेशकरांचा आवाज, राम्बा-साम्बा म्युझिकच्या धर्तीवर दिलेलं ठेका धरायला लावणारं संगीत आणि पडद्यावर भगवान आणि गीताबालीचं अफलातून नृत्य हे कॉम्बिनेशन हिट होणारच होतं. पण तिथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. शेखर सरतांडेल यांनी 'एक अलबेला'च्या उत्तरार्धात हीच कहाणी मांडली आहे. 'अलबेला' सुपरहिट होण्यापर्यंतचाच प्रवास दाखवून त्यांनी या सिनेमासाठी नेमकी चौकट आखून घेतली आहे. सिनेमा केवळ एक तास ४७ मिनिटांचा आहे. वेगवान आणि क्रिस्पी मांडणीमुळं सिनेमाच्या वेधकतेत आणखी भरच पडली आहे.
उत्तरार्धाचं सर्वांत मोठं आकर्षण म्हणजे 'शोला जो भडके' आणि 'भोली सुरत दिल के खोटे' या गाण्याचं दिग्दर्शकानं केलेलं रिक्रिएशन आणि त्यातली मंगेश देसाई आणि विद्या बालन यांची जबरदस्त अदाकारी!  हे मूळचं सोनं एवढं बावनकशी आहे, की ते केवळ जसं आहे तसं मांडलं तरी भागणार होतं. सरतांडेल यांनी हे ओळखून या गाण्यांना व त्याच्या सादरीकरणाला धक्का लावलेला नाही. कुठलाही धोका न पत्करता ते 'फ्रेम टु फ्रेम' रिक्रिएट केलं आहे. हे करताना त्यांना मंगेश देसाई आणि विद्या बालन यांनी समरसून साथ दिल्यानं या दोन्ही गाण्यांचं सोनं पुनश्च झळाळून उठलं आहे, यात शंका नाही. विशेषतः विद्यानं गीताबाली खूपच तन्मयतेनं अंगी भिनवून घेतल्याचं जाणवतं. तिच्या प्रत्येक मुद्रेत, हावभावात आणि नृत्याच्या प्रत्येक स्टेपमध्ये तिनं गीताबाली पुन्हा आपल्यासमोर उभी केली आहे. (विशेषतः 'भोली सुरत' या गाण्यात पहिल्या अंतऱ्याच्या शेवटी तिच्या अत्यंत बोलक्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहावेत.) आज ही दोन्ही (म्हणजे आताची आणि मूळची) गाणी पाहताना त्या गाण्यांतला ठेका आणि नृत्यातली लय एवढी भावते, की त्याचं वर्णन करायला शब्द नाहीत. अगदी समूह नृत्यातील कलाकारही एवढ्या फ्रेश चेहऱ्यानं आणि तन्मयतेनं नाचले आहेत, की आयुष्यात कधीही नाच न केलेल्या माणसांनाही उठून त्यांचा हात हाती धरून नृत्य करावंसं वाटलं पाहिजे.
भगवान यांना त्या वेळी हा सिनेमा बनवताना आलेल्या अडचणी, अॅक्शन पटांतून सामाजिक सिनेमाकडे वळताना चित्रपटसृष्टीतील वितरक, इतर लोकांनी व्यक्त केलेला अविश्वास, गीताबालीला सिनेमासाठी साइन करताना झालेला त्रास, नंतरही तिच्या सेक्रेटरीनं दिलेला त्रास हा सगळा भाग उत्तरार्धात येतो. भगवान यांचं कणखर व्यक्तिमत्त्व समोर येतं. 'लायकीपेक्षा मोठी नसतील, तर ती स्वप्नं काय कामाची?' हा त्यांचा सिद्धान्त होता. तो ते अखेरपर्यंत जगले. 'अलबेला' तयार झाला. प्रदर्शितही झाला. सुरुवातीला प्रेक्षकांचा फार प्रतिसाद नव्हता. तेव्हा भगवानदादांनी स्वतःची सर्व संपत्ती गहाण ठेवून चित्रपट आणखी काही दिवस थिएटरमध्ये ठेवण्याची विनंती केली. त्या दिवशी ते इम्पिरियल थिएटरमध्ये जातात आणि दार उघडून हळूच आत पाहतात. त्यानंतर समोरच्या मोकळ्या जागेत एकटेच खास भगवान शैलीतलं नृत्य करतात हा शॉट जमून आलेला आहे. 'अलबेला' त्या दिवशी हिट झाला. लोकांनी 'शोला जो भडके' गाण्यावर पैसे उधळले. भगवान जिंकले...
प्रमुख व्यक्तिरेखेच्या जीवनात आपल्याला रस निर्माण झाला पाहिजे, त्याच्या सुख-दुःखाशी तो रममाण झाला पाहिजे, तर तो सिनेमा चांगला! 'एक अलबेला' या कसोटीला उतरला आहे, असं म्हटलं पाहिजे. हे दिग्दर्शक सरतांडेल यांचं जसं यश आहे, तसंच ते मंगेश देसाईचंही आहे. मंगेशचा चित्रपटसृष्टीतला प्रवास मी दीर्घकाळ पाहतो आहे. या गुणी कलाकाराला एकाच संधीची आवश्यकता होती. ती या सिनेमाच्या रूपानं त्याला मिळाली आहे आणि त्यानंही या संधीचं सोनं करून दाखवलं आहे. 'एक अलबेला' हा त्याच्या कारकि‍र्दीतला माइलस्टोन सिनेमा ठरणार, यात शंका नाही. भगवानदादांच्या नृत्य शैलीची नक्कल करणं तसं सोपं नाही. पण मंगेशनं मेहनतीनं ते जमवलं आहे.
या सिनेमात गीताबालीच्या भूमिकेच्या रूपानं विद्या बालन प्रथमच मराठीत अवतरली आहे. तिचा प्रसन्न वावर या सिनेमाला 'चार चाँद' लावणारा ठरला आहे. विद्याच्या चाहत्यांसाठी तिला गीताबालीच्या भूमिकेत बघणं ही एक पर्वणी ठरेल. विद्यानं गीताबालीच्या नृत्याची लय अंगी भिनवून घेतल्याचं पदोपदी जाणवतं. तिच्याच आग्रहावरून चित्रित करण्यात आलेला 'शाम ढले खिडकी तले'चा तुकडाही यात आहे.
एवढं सगळं सांगितल्यावर हा सिनेमा आवर्जून पाहाच, हे वेगळं सांगणं म्हणजे भगवानदादा अफलातून नृत्य करीत असत, हे आवर्जून सांगण्यापैकी झालं. जो मनापासून नाचतो, तो जास्त जगतो. (भगवानदादा दीर्घायुषी होते. नव्वदाव्या वर्षी गेले...)
जा, नृत्याची लय अंगी भिनवून घ्या....! कारण आपल्यातही 'एक अलबेला' वस्ती करून आहे... त्याला मस्ती करण्याची संधी कधी देणार?
---

दर्जा - साडेतीन स्टार
---

12 Jun 2016

उडता पंजाब लेख

सिनेमाला मुक्तपणे जगू द्या... 
----------------------------------


सेन्सॉर बोर्ड पुन्हा एकदा नव्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या वेळचं निमित्त आहे ‘उडता पंजाब’ या नव्या चित्रपटाचं. पंजाबमधील अंमली पदार्थांच्या व्यसनात तरुण पिढी कशी वाहून चालली आहे, यावर प्रकाश टाकणारा हा सिनेमा आहे म्हणे. प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यानं या सिनेमाची निर्मिती केली आहे आणि अभिषेक चौबे यानं हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. यात शाहीद कपूर, आलिया भट, करिना कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १७ जूनला सर्वत्र प्रदर्शित व्हायचा होता. पण वादाला सुरुवात झाली ती सेन्सॉरनं हा चित्रपट अडविल्यामुळं. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं तब्बल ९४ कट सुचविले आणि शीर्षकातून पंजाब हे नाव आणि इतर बरंच काय काय कापायला लावलं. म्हणजे तसं केलं तरच हा सिनेमा सेन्सॉरकडून पास होईल, असं सांगितलं. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी यापूर्वी अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत आणि तसे निर्णयही घेतले आहेत. जेम्स बाँडच्या ताज्या चित्रपटातील एक चुंबनदृश्य ५६ सेकंदांवरून २० सेकंदांचं करणारे हेच ते महाशय! निहलानींवर त्या वेळी ‘संस्कारी निहलानी’ अशी टीका माध्यमांतून झाली होती. त्या वेळीही मी ‘हे संस्कार बोर्ड बुडवा’ या शीर्षकाचा लेख लिहिला होता, हे वाचकांना स्मरत असेल.
आता पुन्हा सेन्सॉर बोर्ड चर्चेत आलंय. या वेळी तर निहलानींनी निर्माता अनुराग कश्यपवर थेट आरोप केलाय. पंजाबमध्ये लवकरच विधानसभेची निवडणूक होऊ घातलीय. त्यात आम आदमी पक्षाला (आप) अनुकूल वातावरण आहे, असं आत्ताचं चित्र आहे. तर अनुराग कश्यप हा ‘आप’चा असून, त्यानं त्या पक्षाकडून पैसे घेऊन सध्याच्या सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्यासाठी हा चित्रपट तयार केलाय, असा गंभीर आरोप निहलानी यांनी केलाय. अनुरागनं हा आरोप हसण्यावारी नेलाय आणि निहलानींना खोटंही धड बोलता येत नाही, अशी टिप्पणी केलीय.
 यात सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांनी सरळ सरळ राजकीय भूमिका घेतली आहे. ‘मी नरेंद्र मोदींचा चमचा आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. मोदींचा नाही तर काय इटलीच्या पंतप्रधानांचा चमचा व्हायचं का?’ असे बाणेदार उद्-गार निहलानी साहेबांनी काढले आहेत. चमचा होण्याची एवढी असोशी आत्तापर्यंत कुणातच पाहिली नव्हती. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी आतापर्यंत जे जे लोक विराजमान झाले, ते सगळे काही या एकाच गुणामुळं तिथं पोचले नव्हते, याचं भान निहलानींना असण्याचं कारण नाही. बाकी निहलानींसारखे लोक सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी आणि गजेंद्र चौहान एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्त करून केंद्र सरकारनं एकूण आपली या विषयातली रुची आणि गती दाखवून दिलीच आहे. त्यामुळं निहलानींसारख्यांना रान मोकळंच मिळालं आहे. एवढे दिवस ते किमान सिनेमाशी संबंधित वाद निर्माण करीत होते. आता त्यांनी थेट राजकीय वाद निर्माण करून पुढचं पाऊल गाठलं आहे. ‘उडता पंजाब’ जात्यात आहे, पण बाकीचे सुपात आहेत आणि त्यांनाही कधी तरी या सेन्सॉरशाहीचा सामना करावा लागणार आहे, हे नक्की. कदाचित याची चाहूल लागल्यामुळेच की काय, बॉलिवूडमधले इतर निर्माते-दिग्दर्शकही अनुराग कश्यपसोबत उभे राहिले आणि या सर्वांनी सेन्सॉरविषयी आवाज उठविला. किमान वरकरणी तरी सगळे एक दिसत आहेत.
अर्थात हे सगळे बॉलिवूडवासी निर्माते आणि दिग्दर्शक सगळेच काही धुतल्या तांदळासारखे आहेत, असं मुळीच नाही. उगवत्या सूर्याला नमस्कार करणे आणि वारा पाहून टोपी फिरवणे यात ते पटाईत आहेत. शिवाय त्यांचं तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्य ‘सिलेक्टिव्ह’ असतं, हे वारंवार दिसून आलं आहे. बाकी कलात्मक मूल्यांशी निष्ठा, सहकलाकारांविषयी आस्था आणि संवेदनशीलतेविषयी न बोललेलंच बरं. आत्ताही या वादात बॉलिवूडमधले एरवी कायम नाकानं कांदे सोलणारे काही बडे लोक ‘अळीमिळी गुपचिळी’ बसले आहेत, हे लोकांच्या लक्षात आहे. या लोकांच्या राजकीय प्रेरणा काय आहेत, हे सर्वांना ठाऊक आहे. ‘पोलिटिकली करेक्ट’ असण्याची त्यांची धडपड लाजवाब असते. सर्वसामान्य लोकांचं एखाद्या गोष्टीविषयी एक मत असेल, तर यांचं नेमकं त्याविरुद्ध असणार, हे धरूनच चालावं. त्यामुळं अनुरागनंही उच्चरवात सेन्सॉरविरोधात डरकाळी फोडताना, आपल्याच व्यवसायबंधूंच्या दांभिकतेविषयीही कधी तरी बोलावं. सिनेमातले लोकही राजकीयदृष्ट्या प्रेरित असतात आणि स्वतःच्या फायद्यासाठीच ते आपली टोपी वारंवार फिरत असतात, हे सत्य आहेच. ‘उडता पंजाब’विषयी नक्की काय घडलंय हे समोर येईलच. पण कुणा राजकीय पक्षाची ‘सुपारी’ घेऊन असे सिनेमे कुणी काढू लागलं, तर उद्या तशा नसलेल्या सिनेमाकडंही लोक संशयानं पाहतील आणि एकूणच या व्यवसायाचंच दीर्घकालीन नुकसान होईल, यात दुमत नसावं.
सेन्सॉर बोर्ड, राजकारण आणि बॉलिवूडवाल्यांचे इगो यात सर्वांत भरडला जाणार आहे तो खरा, अस्सल सिनेमा. आपल्याकडचा सिनेमा मोकळा श्वास घेऊ लागलाय तो गेल्या १५-२० वर्षांत. त्यापूर्वी वेगळ्या सिनेमाचे प्रयत्न होतच नव्हते असं नाही. पण मल्टिप्लेक्सच्या आगमनानंतर या सिनेमाला हक्काची जागा मिळाली. त्यातून अनुराग कश्यप, दिबाकर बॅनर्जी, रीमा कागती, झोया अख्तर यांच्यापासून ते अभिषेक चौबेपर्यंत अनेक नवे दिग्दर्शक वेगळ्या प्रकारच्या कलाकृती घेऊन समोर येऊ लागले. हा सिनेमा प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारला. या सर्वांचे प्रयत्न प्रामाणिक होते, सच्चे होते हे जाणवत होतं. काही तरी मांडायची, सांगायची त्यांची असोशी प्रेक्षकांना कळत होती. ज्याला जे सांगायचंय ते सांगता येतंय आणि ज्याला ते पाहायचंय ते पाहता येतंय अशी ही सोयिस्कर आणि लोकशाहीयुक्त मांडणी होती. समाजातल्या विविध वर्गांतल्या गटांना, जातिसमूहांना हा सिनेमा साद घालत होता आणि आहे. इथल्या चुकीच्या प्रथांना, कथित संस्कारांना हा सिनेमा प्रश्न विचारू लागला होता आणि आहे. गेल्या २५ वर्षांत देशात आर्थिक उदारीकरण आल्यानंतर पुलाखालून पुष्कळच पाणी वाहून गेलं. त्यानंतर जन्मलेली पिढी आज पंचविशीत आहे. त्यातले अनेक जण या सिनेमासृष्टीत आहेत. नवे प्रयत्न करीत आहेत. हात-पाय हलवीत आहेत. आपल्या जाणिवा तपासून पाहत आहेत. नवं काही तरी शोधत आहेत. मांडत आहेत. अशा वेळी सेन्सॉर बोर्डानं प्रागतिक भूमिका घ्यायला हवी. या नव्या लाटेला, नवा आशांना, नव्या स्वप्नांना योग्य दिशा दाखवायला हवी. त्याउलट हे करू नका, ते करू नका, असं घरातल्या एखाद्या किरकिऱ्या आणि जुन्या काळासोबत गोठलेल्या आजोबांसारखं हे सेन्सॉर बोर्ड किरकिर करू पाहतंय. तुमचे राजकीय हितसंबंध काय असायचे ते असोत, तुम्हाला कुणाचे चमचे व्हायचंय की कुणाचे तळवे चाटायचेत हा तुमचा प्रश्न आहे. पण इथल्या नव्या दमाच्या तरुणांना, इथल्या अभिव्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केलात, तर ती तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही, हे या लोकांनी नीट लक्षात ठेवायला हवं. सत्ताधीशांपेक्षा कधी कधी सत्तेच्या आश्रयानं वाढणारी बांडगुळंच जास्त माज करतात, हे अनेकदा दिसून येतं. पण या बांडगुळांमुळं सत्ताधीशांच्या वृक्षातला जीवनरस शोषला जाऊन एके दिवशी तो महाकाय वृक्षही जमीनदोस्त होतो, हे सत्ताधीशांनी लक्षात घ्यावं.
सेन्सॉर बोर्डाला दादा कोंडके ‘शेणसार बोर्ड’ म्हणत. याचं कारण या सेन्सॉर बोर्डानं त्याला नेमून दिलेली कामं सोडून इतर गोष्टींत नाक खुपसण्याचे उद्योगच पुष्कळ केलेले बघायला मिळतात. सेन्सॉर बोर्ड नामक ही यंत्रणा अस्तित्वातच नको, असं काही लोक म्हणतात. एवढा टोकाचा विचार करायला नको; पण या बोर्डानं काळाप्रमाणं बदलावं आणि तिथं किमान आजच्या नव्या सिनेमाची नवी भाषा जाणणारी, तरुणांच्या आदरस्थानी असलेली ज्येष्ठ मंडळी कधी तरी बसावीत. सरकारनं आपल्या स्वतःच्या हितासाठी तरी हे करावं. म्हणजे मग ‘उडता पंजाब’सारखे वाद भविष्यात होणार नाहीत.
---

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र  टाइम्स, पुणे आवृत्ती; १२ जून २०१६)
---