27 Mar 2020

मटा लेख - करोना कसोटीचा काळ

कसोटीचा काळ
--------------------

मानवी जीवनाच्या अस्तित्वापासून आतापर्यंत प्रत्येक विशिष्ट टप्प्यानंतर एक कसोटीचा काळ मानवी जमातीच्या वाट्याला आला आहे. नैसर्गिक आपत्ती, साथीचे रोग, महायुद्धे यात हजारो, लाखो माणसे जिवानिशी गेली आहेत. अगदी गेल्या शतकाच्या पूर्वार्धातही आपल्या राज्यात, देशात प्लेगच्या साथीने हजारो माणसे मरण पावली. महाराष्ट्र व कर्नाटकात इ. स. १३९६ ते १४०७ या बारा वर्षांत सलग पडलेला व हजारो लोकांचा प्राण घेणारा ‘दुर्गादेवीचा दुष्काळ’ही कुख्यात आहे. पानिपतची तिन्ही युद्धं आणि एकूण मध्ययुगात झालेली सगळीच युद्धं कित्येक हजार माणसांचे जीव घेऊनच संपली. विसाव्या शतकात झालेल्या पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाची प्रत्यक्ष नसली, तर अप्रत्यक्ष झळ आपल्याला बसलीच होती. फाळणीच्या वेळी तर पंजाब व बंगाल या प्रांतांना सर्वाधिक झळ बसली व हजारोंचं रक्त सांडलं. याशिवाय भारतात त्सुनामी, भूकंप, महापूर अशा नैसर्गिक संकटांनी ठरावीक काळानंतर शेकडो-हजारो माणसं हे जग सोडून जातात. एकविसाव्या शतकात सर्वांत स्मार्ट तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे आपल्याला अगदी सुरक्षित समजून चाललो होतो. एखाद्या वेगवान घोड्यावर स्वार होऊन स्वैरपणे दौडत निघावं, तसे आपण सगळेच जण पत्ता माहिती नसलेल्या सुखाच्या शोधात बेफाम दौडत होतो. अचानक घोड्याच्या पायात ‘करोना विषाणू’चा अडथळा येऊन आपण धाडकन आपटलो आहोत. पुरते जखमी झालो आहोत. त्यामुळे गती थांबली आहे व मती गुंग झाली आहे!
सध्याचा काळ कसोटीचा आहे. आपल्यातल्या ‘माणसा’ची ही कसोटी आहे. माणसं म्हटली, की वेगवेगळे स्वभाव आले. प्रत्येक जण या संकटाला वेगळ्या पद्धतीने सामोरा जातो आहे. या संकटाला तोंड देण्याची प्रत्येकाची रीत वेगळी आहे. कुणी खूप घाबरलंय, तर कुणी खूप बेफिकिरी दाखवतंय. कुणी मनातून घाबरलंय, पण उसनं अवसान आणतंय; तर कुणी खरोखर खंबीरपणे उभे आहेत. अशा वेळी आपल्यातल्या मनोधैर्य, संयम, चिकाटी, निग्रह आदी गुणांची कसोटी लागणार आहे. हे शब्द कधी तरी विशेषणं म्हणून शिकलो असू, पण आज आपल्यात त्या विशेषणांची रुजवण करणं आवश्यक झालंय. संकटकाळात सर्वाधिक कसोटी लागते ती माणुसकीची. जीव वाचविण्यासाठी आपल्या पिलाला पायाखाली धरून पाण्याबाहेर येणाऱ्या माकडिणीची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. आजूबाजूला जरादेखील सामाजिक संकटांची चाहूल लागली, की आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावणारे या माकडिणीच्या कुळातले अनेक जण आता दिसतील. आपल्या घरी अन्नधान्याचा गरज नसताना भरपूर साठा करून ठेवणारे, रांगा मोडून मॉलमधल्या वस्तू हडप करणारे, क्वचित दुसऱ्याच्या हातातल्या वस्तू ओरबाडणारे लोक आपल्याला आजूबाजूला दिसतातच. दुसऱ्या बाजूला स्वत:चं घरदार विसरून आजारी रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी, सार्वजनिक वाहतूक सेवांचे ड्रायव्हर-कंडक्टर, अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलिस, मेडिकल दुकानदार असे किती तरी लोक या संकटाचा निर्धाराने सामना करतानाही दिसत आहेत. आपण कुठल्या बाजूला असावं हे ठरविण्याची, आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला आवाहन करण्याची हीच ती वेळ!
एखाद्या आपत्तीतून चांगलं काही तरी निघतं, असं म्हणतात. आत्ताच्या या आपत्तीची एकूण व्याप्ती व भयावहता अजून तरी आपल्याला पूर्णपणे समजली आहे का, हा प्रश्नच आहे. मात्र, अगदी नजीकच्या काळात तरी ती संपुष्टात येईल अशी चिन्हे आत्ता तरी दिसत नाहीत. तेव्हा आता या आपत्तीला इष्टापत्ती मानून आपल्याला आपल्या सगळ्या जगण्याचाच फेरविचार करण्याची ही उत्तम संधी आहे. आपल्या भयंकर वेगाने निघालेल्या महानगरी जगण्याला सक्तीने मिळालेली ही विश्रांती आहे. हा ‘पॉज’, हा अल्पविराम समजून घ्यायला हवा. आपण आपल्या जगण्यात केवळ ‘पीअर प्रेशर’नं कित्येक गोष्टी करीत आलो आहोत का, याचाही पुन्हा एकदा आढावा घ्यायची गरज आहे. भौतिक सुखांच्या मागे अनावर ओढीनं तुफान धावत सुटलेलो आपण... गेल्या किमान दहा वर्षांत किती वेळा हा वेग स्वत:हून कमी केला आहे, हे तपासून पाहायला हवं. अधिक हवे, अजून अधिक हवे या हव्यासापोटी आपण बेभान झालो. आपली महानगरं वाढत्या लोकसंख्येमुळं रोगटपणे सुजली, फुगली. रस्त्यांवरच्या चारचाकी वाढल्या, प्रदूषण वाढलं. वाहतूक कोंडी तर रोजचीच डोकेदुखी झाली.
महानगरांत रोजगार मिळाला, हातात पैसा आला. मग तो खर्च करण्याची वेगवेगळी ठिकाणं आली. मॉल, मल्टिप्लेक्स, स्पा, रिसॉर्ट, परदेश प्रवास अशा एक ना दोन मार्गांनी खर्चाचा ओघ वाढू लागला. पैशाची पाकिटं जाडजूड होती. त्यामुळं हे खर्चही काहीच वाटेनासे झाले. मग सोशल आउटिंग, मग त्या नावाखाली मद्यपान, महागड्या गाड्या, सुपर हाय-वे... अशी सगळी मस्त धुंदी चढली डोळ्यांवर! याच काळात आजूबाजूला सगळेच एवढे भाग्यवान नाहीत, याचंही भान सुटलं. पूर्वीच्या काळी सगळ्यांमध्येच एक प्रखर सामाजिक जाणीव असायची. आता ती धूसर होत चालली. कुटुंबातलाच संवाद संपत चालला, तिथं बाकी समाजाची काय कथा! आपण अधिकाधिक स्वकेंद्रित, आत्ममग्न होत चाललो. मी, माझं, मला यापलीकडे काही सुचेनासं झालं. आपलं वर्तुळ आपण आकसत आकसत स्वत:च्या केंद्रबिंदूपुरतं छोटं करून टाकलं. तिथं अन्य कुणालाही प्रवेश नव्हता. त्यामुळं अलीकडच्या काळात नैसर्गिक आपत्ती आल्या, तरी त्याला आपण दिलेला प्रतिसाद बघण्यासारखा होता. मागच्याच वर्षी पुण्यात दोन वेळा प्रचंड पूर आला होता. त्या वेळी पहिल्यांदाच अशी भीती वाटली होती. दहा-बारा वर्षांपूर्वी ‘स्वाइन फ्लू’चं संकट आपण झेललं. तेव्हाच्या आणि आताच्या प्रतिसादात निश्चितच फरक पडला होता. आता आपल्याला स्वत:पलीकडं पाहायला फुरसतच नाही, अशी स्थिती आहे.
‘करोना’नं जे जागतिक संकट आणलंय, त्यामुळं या सगळ्या सुखासीनतेला खाडकन शॉक बसावा तसा जोरदार धक्का बसला आहे. सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या तशा, आपल्याला वाटेल तशा होणार नाहीत, याची जळजळीत जाणीव या संसर्गजन्य विषाणूनं करून दिली आहे. आपल्याला निसर्गाचे नियम पाळावेच लागतील आणि माणूस म्हणून, समाज म्हणून जगण्यासाठी जे सर्वमान्य नियम केले आहेत, तेही कसोशीनं पाळावे लागतील, हे या संकटानं पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. संगणकाच्या भाषेत सांगायचं तर जगणं कदाचित पुन्हा ‘रिसेट’ केलं गेलंय. आता सगळ्याच धारणा पुन्हा तपासून पाहायची वेळ आली आहे. वैयक्तिक आयुष्यात आपल्यावर अचानक एखादं संकट कोसळलं, तर आपण भांबावून जातो, घाबरून जातो, खचतो. इथं संपूर्ण मानवजातीवरच हे संकट घोंघावतं आहे. त्यामुळं जी काही भीती आहे ती जागतिक आहे. आपल्या जिवाची काळजी प्रत्येकालाच आहे. उद्या या विषाणूवरही लस नक्कीच निघेल. सगळं काही पूर्वीसारखं होईल. पण आपण त्यानिमित्ताने आपल्या या भयावह वेगवान जीवनशैलीत बदल केला तर ते सगळ्यांच्याच फायद्याचं होईल, यात शंका नाही. मृत्यू समोर दिसला, की भलेभले गारठतात. माणसाला आपला जीव सर्वांत प्यारा असतो. आता आपलाच नाही तर सगळ्यांचाच जीव वाचविण्याची वेळ आहे. हा एक इशारा आहे, असं समजून आपल्या सगळ्या जगण्यालाच वेगळं वळण देता येतं का पाहूया. कमीत कमी वस्तूंमध्ये भागविण्याची ‘मिनिमलिस्ट’ जीवनशैली अंगिकारता येईल का? पुन्हा खेड्याकडे जाता येईल का? सर्वत्र धान्य किंवा भाजीपाला नैसर्गिक पद्धतीनेच पिकविता येईल का? किमान शहरांतील प्रदूषण कमी करता येईल का? थुंकण्यासारख्या अनारोग्यकारक विकारांतून कायमची सुटका करून घेता येईल का? रोजच्या जगण्याला आवश्यक तेवढी किमान कामं आपण करू शकतो का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधता येतील.
देव करो आणि हे संकट लवकर टळो. पण त्यानिमित्तानं हे काही बदल आपण केले आणि नंतर काही काळानंतर पाहिलं, तर कदाचित आपलं जगणं अधिक स्वच्छ, सुंदर, निरोगी झालेलं दिसेल!

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, २२ मार्च २०२०)

---

16 Mar 2020

मटा - करोना लेख

सकारात्मक, तत्पर...
-------------------------


करोना विषाणूनं सध्या आपल्या जगण्यात ‘जंतुप्रवेश’ करून हलकल्लोळ उडवून दिलाय. जग कितीही प्रगत, पुढारलेलं झालं असलं, तरी एक साध्या डोळ्यांनीही दिसू न शकणारा विषाणू आपल्या सगळ्या मानवजातीला कसा मुळापासून हादरवून सोडू शकतो, याचा करुण अनुभव आपण घेत आहोत. माणसाचं जगणं किती ‘व्हल्नरेबल’ आहे, याची पदोपदी जाणीव होते आहे. आपल्या देशात आधीच कमी समस्या होत्या जणू, म्हणून या नव्या साथरोगाची भर त्यात पडली! असं काही झालं, की आपल्याकडं स्वाभाविकच त्याच गोष्टीवर सगळीकडं चर्चा सुरू होते. हल्ली सोशल मीडियामुळं सल्ला आणि शहाणपण यांचं मोफत वितरण सगळीकडं सुरू असतं. त्यातून अफवा नावाचा एक नवाच व्हायरस धुमाकूळ घालायला लागतो. अशा वेळी खरोखरच या ‘करोना’नं आपल्या देशात जास्त प्रमाणात शिरकाव केला तर काय होईल, या विचारानं झोप उडते. आपल्या देशातील खूप जास्त लोकसंख्या, गर्दीची ठिकाणं, लोकांच्या अनारोग्यकारक सवयी, स्वच्छतेचा अभाव, आरोग्य सुविधांची वानवा आणि एकूणच प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता यामुळं साथरोगासारख्या एखाद्या मोठ्या संकटाला तोंड देण्यात आपण कमी पडू की काय, असं सतत वाटत राहतं.
आताचं चित्र मात्र सुदैवानं तसं नाही. आपल्या देशाला कुणी कितीही नावं ठेवली, तरी इथं काही-एक व्यवस्था आहे आणि ती कुठल्याही संकटाला समर्थपणे तोंड देऊ शकते, असा विश्वास प्रत्येकाच्या मनात निर्माण होईल, एवढं चांगलं काम आपल्या सरकारकडून आणि प्रशासनाकडून होतंय. अशा आपत्तीच्या काळात सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ठोस निर्णय घेणारं सरकार आणि त्याची कार्यक्षमतेनं अंमलबजावणी करणारी नोकरशाही! या दोघांनाही अर्थातच देशभरातल्या सर्वच सामान्य नागरिकांची मनापासून साथ असणंही तितकंच महत्त्वाचं आणि आवश्यक असतं. या वेळी आपल्याकडं या तिन्ही गोष्टींचा चांगला मिलाफ झालेला दिसतो. त्यामुळं ‘करोना’चा मुकाबला आपण आत्मविश्वासाने आणि यशस्वीपणे करू शकू, असं म्हणायला हरकत नाही. आरोग्य, औषधनिर्माण व प्रशासन या क्षेत्रांत काम करणाऱ्या काही तज्ज्ञांशी याविषयी चर्चा केल्यानंतर तर याची खात्रीच पटली!
अशा जागतिक संकटाच्या वेळी कुठल्याही प्रसंगाला त्वरित प्रतिसाद देणं गरजेचं असतं. या वेळी सरकारनं तशी पावलं उचलली. ‘करोना’कडं दुर्लक्ष केल्यास काय होतं, याचं उदाहरण इटली आणि इराणच्या रूपानं आपल्या समोर आहे. ‘करोना’ची बाधा झालेल्या लोकांचं तातडीनं विलगीकरण करणं आणि त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू करणं या गोष्टी तिथं त्वरेनं झाल्या नाहीत. त्यामुळं आपल्यापेक्षा किती तरी आधुनिक आरोग्य सुविधा असूनही त्या देशातील मृतांची संख्या किती तरी पटींनी जास्त आहे. तीच गोष्ट इराणची. आपल्याकडं आपल्याला असं दुर्लक्ष करणं परवडणार नाही. मुळात हा विषाणू किती लोकांच्या अंगात भिनलाय आणि ते लोक आणखी किती लोकांना संसर्ग पोचवू शकतात, हे लक्षात यायला किमान १४ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळं अशा रुग्णांना तातडीनं शोधणं, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवणं व त्वरित उपचार सुरू करणं हे अत्यावश्यक असतं. आपल्याकडं पहिल्या टप्प्यात या गोष्टी झाल्या नसल्या, तरी केरळमध्ये पहिला रुग्ण सापडल्यापासून मात्र केंद्र सरकार व संबंधित राज्य सरकारांनी त्वरित हालचाली केल्या. मार्च उजाडल्यानंतर महाराष्ट्रात पहिले रुग्ण नोंदविले गेले. लवकरच ही संख्या ८० च्या घरात गेली. तुलनेनं हे प्रमाण कमी असलं तरी प्रसार रोखण्यासाठी व्यापक उपाययोजनांची गरज होती. ते उपाय सरकारनं त्वरित केले. एक तर आपण इतर देशांच्या नागरिकांचा व्हिसा स्थगित केला. त्यामुळे बाहेरचे नागरिक आपल्या देशात येणं बंद झालं. हे करणं आवश्यक होतं. कारण भारतात आत्तापर्यंत झालेला संसर्ग हा परदेशातून इथे आलेल्या लोकांनाच झालेला दिसतो. याशिवाय विमानतळांवर स्क्रीनिंगची व्यवस्था उभारण्यात आली. परदेशांतून आलेल्या ज्या लोकांना संसर्ग झाल्याचा संशय आहे किंवा ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशा सर्व रुग्णांना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची व्यापक शोधमोहीम प्रशासनाच्या पातळीवर सुरू करण्यात आली. ही कार्यतत्परता अभूतपूर्व होती. या जोडीनं रुग्णांची संख्या वाढीला लागल्याबरोबर विविध राज्य सरकारांनी सार्वजनिक ठिकाणांवरील माणसांचा वावर कमी करण्यासाठी सक्तीच्या ‘बंदी’च्या घोषणा केल्या. त्या योग्यच होत्या. या उपाययोजनांमुळं नागरिकांत काहीशी घबराट पसरल्यासारखी वाटली, तरी अंतिमत: हे उपाय सर्वांच्या हिताचेच आहेत, यात शंका नाही.
परदेशांत राहणाऱ्या आपल्या नागरिकांची काळजी घेणारा भारत हा जगातील सर्वांत अग्रणी देश आहे, यात दुमत नसावं. चीनमधल्या वुहान या शहरातून आणि इतरही ठिकाणांहून भारताने सर्वाधिक विमानफेऱ्या करून आपली माणसं परत देशात आणली. केवळ भारतीयच नव्हेत, तर बांगलादेशच्या नागरिकांनाही भारताने तेथून परत आणले. इराणमध्येही आपण लष्करी विमान पाठवून तेथील भारतीय नागरिकांना आणण्याची तत्परता दाखवलीय. एवढेच नव्हे, तर इराणमध्येच मेडिकल सेटअप उभारून तपासणीची सोय करण्याचीही तयारी भारताने दर्शविली होती. मात्र, इराणच्या आडमुठेपणामुळे ते काही होऊ शकलं नाही.
आपल्याकडच्या विषाणू शास्त्रज्ञांचं आणि डॉक्टरांचंही कौतुक करायला हवं. त्यांनी ‘करोना’च्या तपासणीसाठी लागणारा वेळ प्रयत्नपूर्वक कमी केला आहे. विकसित देशांपेक्षाही वेगाने ही तपासणी आपल्याकडे होते आहे. याखेरीज देशभरात अल्पावधीत आणखी मोठ्या प्रमाणात या प्रयोगशाळा उभारण्याचा निर्धार केंद्र सरकारनं केला आहे. त्यामुळं इतर विकसनशील देश अशा प्रयोगशाळा उभारून देण्याची मागणी आपल्या देशाकडे करू लागले आहेत. मालदीवसारख्या छोट्या देशात तर आपण मदतीसाठी वैद्यकीय पथकही पुरेशा तयारीनं पाठवलं आहे. मास्क आदी वस्तूंचा पुरवठा करण्यात चीन आघाडीवर असतो. मात्र, तेथे आता या वस्तूंचा तुटवडा जाणवू लागल्यावर भारतानेच या वस्तूंचा पुरवठा त्या देशाला सुरू केला आहे. आपल्याकडे औषधांच्या किमतीही तुलनेनं स्वस्त आहेत. आपल्याकडे अनेक सेवाभावी डॉक्टर आणि स्वयंसेवी संस्था अशा वेळी सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला पुढं येतात, हेही आपण कायम अनुभवत असतो.
आपल्या देशात काहीएक व्यवस्था आहे आणि प्रसंग पडला, की ती खंबीरपणे काम करून आपलं कर्तव्य निभावत असते. लोकांच्या प्रश्नांचं भान असलेले लोकप्रतिनिधी, प्रशासनातील मेहनती अधिकारी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे लाखो कर्मचारी-अधिकारी व डॉक्टर यांच्या कार्यतत्परतेचं कौतुक करायलाच हवं. अशा वेळी मला आपला देश गावाकडच्या जुन्या-जाणत्या, अनुभवी शहाणपण असलेल्या समजूतदार वडीलधाऱ्यासारखा भासतो. विकसित देश म्हणजे ‘शहरं’ म्हटलं, तर आपला देश म्हणजे ‘गाव’च आहे, यात दुमत नसावं. आपल्या देशात अनेक त्रुटी आहेत, कमतरता आहे, बेशिस्त आहे.... हे सगळं मान्य करूनही इथले बहुसंख्य कष्टाळू, ‘जुगाडू’ आणि शहाणपण असलेले लोक जगातल्या कुठल्याही संकटावर मात करू शकतील, यावर माझा ठाम विश्वास आहे. ‘करोना’चं आव्हानही असंच परतवून लावू, यात काहीच शंका नाही.

---
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; १५ मार्च २०२०)

---