31 May 2020

संवादसेतू दिवाळी अंक २०१९ लेख

सिनेमा : ‘तेव्हा’चा आणि ‘आता’चा...
-----------------------------------


कुठलीही कलाकृती ही त्या त्या काळाचं अपत्य असते, असं म्हणतात. म्हणजेच एखादी कलाकृती जन्म घेत असताना तिच्या सभोवतीच्या पर्यावरणाचा परिणाम तिच्यावर या ना त्या प्रकारे होतच असतो. हा काळाचा संदर्भ घट्ट असतो. रुढी, रिवाज, परंपरा, चालीरीती, समजुती, संस्कार, पालनपोषण या सगळ्यांचा आपल्यावर आधी एक समाज म्हणून आणि नंतर एक व्यक्ती म्हणून प्रभाव पडलेला असतो. आपल्या समजुतीतून साकारलेली कलाकृतीही त्यामुळं या प्रभावापासून मुक्त राहू शकत नाही. मात्र, काही वेळा काही कलाकृती ‘अजरामर’ आहेत, ‘कालातीत’ आहेत, असंही आपण म्हणतो. याचाच अर्थ, त्या कलाकृतीवर असलेला तात्कालिकतेचा शिक्का दूर करण्यात ती कलाकृती यशस्वी ठरलेली असते. हा तात्कालिकतेचा शिक्का किंवा पगडा दूर करण्यासाठी त्या कलाकृतीत काही तरी कालातीत, शाश्वत विचार असावा लागतो. साधारणत: वर्षानुवर्षे चालत आलेला ‘सत्’ आणि ‘असत्’ यांच्यातील झगडा किंवा मूलभूत मानवी प्रेरणांचा संघर्ष आणि मानवी मूल्यांची जपणूक अशा गोष्टी प्रभावीपणे मांडल्या गेल्या असतील, तर त्या काही प्रमाणात कालातीत ठरू शकतात. मात्र, काळाच्याही पुढचा, क्रांतिकारी विचार देणारी कलाकृती खऱ्या अर्थाने काळावर मात करणारी कलाकृती म्हणावी लागेल. यासाठी त्या कलाकृतीचा निर्माता द्रष्टा असावा लागतो. काळाची पावले ओळखणारा असावा लागतो. याखेरीज काही जणांमध्ये असामान्य गुण असतात. अशा व्यक्ती अनेक शतकांत क्वचित कधी तरी जन्माला येतात. अशा माणसांनी केलेलं कार्य किंवा त्यांनी निर्माण केलेली कोणतीही कलाकृती असामान्यच ठरते. 
या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या शतकाहून अधिक काळ भारतीय जनमानसावर मोहिनी घालणाऱ्या चित्रपट नामक कलाप्रकाराकडे बघायला पाहिजे. आधी दृश्य आणि नंतर दृश्य व श्रुती या दोन्ही माध्यमांतून या यंत्राधिष्ठित कलेनं भारतीय प्रेक्षकांवर गारूड केलं. भारतीय प्रेक्षकांनी फार थोड्या काळात या कलेवर मन:पूत प्रेम केलं; ही कला आत्मसात केली आणि तिच्याद्वारे आपली अभिव्यक्तीही शोधली. भारतीय सिनेमाची प्रगती आणि देशाची त्या त्या वेळची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक स्थिती यांचा मेळ लावता येतो. या प्रवासात काही अजरामर चित्रपट निर्माण झाले. सर्व सूर जुळून आलेल्या सुरेल गाण्याप्रमाणे लोक हे चित्रपट सतत गुणगुणत राहिले. त्यांचे गुण गात राहिले, त्यांच्याविषयी बोलत राहिले. पिढ्या बदलल्या, तरी यात खंड पडला नाही. मात्र, काही चित्रपटांबाबत काळानुरूप आस्वादन बदलू शकते. विशेषत: एका पिढीला आवडलेला चित्रपट पुढच्या पिढीला आवडेलच असं काही नाही. अशा काही चित्रपटांवर नव्या पिढीला लिहितं करण्याचा अभिनव प्रयोग या अंकाच्या संपादकांनी केला आहे. चित्रपट समीक्षेच्या अंगाने तर या प्रयोगाचं महत्त्व आहेच; शिवाय यात काळानुरूप बदललेल्या किंवा न बदललेल्या दृष्टिकोनाचाही अभ्यास करता येतो. त्या दृष्टीने या अंकात सुजाता, प्यासा, दस्तक, छोटी सी बात, अमर अकबर अँथनी, घरोंदा, अर्थ, इजाजत व वजूद या नऊ सिनेमांवर दहा लेख (‘प्यासा’वर दोन लेख) जुई कुलकर्णी, मृदुला बे‌ळ‌े, अदिती जोगळेकर-हर्डीकर, सानिया भालेराव, अतुल कुलकर्णी, विद्या पोळ-जगताप, विभव देशपांडे, नचिकेत खासनीस, पवन जोशी, आदित्य महाजन या नव्या पिढीच्या प्रतिनिधींनी लिहिले आहेत. या चित्रपटांची निवडही या लेखकांनीच केली आहे. हे चित्रपट त्यांना कसे वाटतात याबद्दल त्यांनी मोकळेपणानं लिहिलं आहे. ‘प्यासा’ चित्रपटावर विद्या पोळ-जगताप व अदिती जोगळेकर-हर्डीकर यांनी लिहिलं आहे. अदिती जोगळेकर यांनी ‘प्यासा’च्या दृश्यात्मकतेवर भर देणारा लेख लिहिलाय, तर विद्या पोळ-जगताप यांनी या चित्रपटाच्या आशयाबाबत लिहिलं आहे. ‘सुजाता’ हा चित्रपट जुई कुलकर्णी यांना नायिकेचा ‘को ‌‌ऽ हं ऽ’ प्रश्न वाटतो. नुकत्याच आलेल्या ‘आर्टिकल १५’ या चित्रपटातही हेच वास्तव दिसतं, असं निरीक्षण त्या नोंदवतात. ‘वजूद’ हा नाना पाटेकरच्या नेहमीच्या प्रतिमेपेक्षा वेगळी भूमिका असलेला चित्रपट १९९८ मध्ये आला होता. आज वीस वर्षांनी त्यातली काव्यात्मकता आजच्या पिढीच्या विभव देशपांडेला भावते. ‘घरोंदा’ हा गुलजार यांचा चित्रपट पाहताना आदित्य महाजनला तो केवळ त्या काळाचा चित्रपट वाटत नाही. अलीकडच्या ‘वेक अप सिद’ किंवा ‘डबल सीट’ या मराठी चित्रपटातही त्याला ‘घरोंदा’चे अंश आढळतात. ‘घरोंदा’तली गाणीही नव्या पिढीच्या आदित्यला आकर्षित करतात. तेव्हाच्या आयुष्यात असलेला साधेपणा, संथपणा यांच्याकडे काहीशा अलिप्तपणे पाहताना आदित्यला त्या काळातला हलकाफुलका रोमान्स विशेष भावतो. 
बासू चटर्जींच्या ‘छोटी सी बात’ या हलक्याफुलक्या सिनेमाकडे आजच्या पिढीचा पवन जोशी कौतुकानं पाहतो. तेव्हाच्या शांत, निवांत मुंबईतल्या निरागस प्रेमाचा कॅलिडोस्कोप या चित्रपटातून दिग्दर्शक आपल्याला दाखवतो, तेव्हा आपल्याला त्यातली जी सौंदर्यस्थळं जाणवतात, तीच पवन जोशीलाही भावतात. महेश भट यांचा १९८२ मध्ये आलेला ‘अर्थ’ हा चित्रपट आजच्या पिढीच्या सानिया भालेरावला ‘पाथब्रेकिंग’ चित्रपट वाटतो. मित्र, प्रियकर यांच्यापैकी एक हवा, किंवा दोघंही नकोत हे ठरविण्याचा अधिकार यात बाईला होता, ही गोष्ट सानियाला महत्त्वाची वाटते. तेव्हाच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता, या चित्रपटातील नायिकेचं असं चित्रण ही काळाच्या पुढचीच गोष्ट होती, असं तिला वाटतं. राजेंद्रसिंग बेदींच्या ‘दस्तक’विषयी, त्यातल्या गाण्यांविषयी लिहिताना अतुल कुलकर्णी भारावून जातात. गुलजारांचाच ‘इजाजत’ पाहताना मृदुला बेळेंना शरदबाबूंचा ‘देवदास’ आठवतो. ‘इजाजत’मधील स्त्री-पुरुष संबंधांचे गहिरे रूप उलगडताना पाहणं कुठल्याही पिढीच्या प्रेक्षकांसाठी एक वेगळी जाणीव करून देणारा प्रवास असतो. मनमोहन देसाईंचा ‘एव्हरग्रीन’ असा ‘अमर अकबर अँथनी’ हा चित्रपट पाहताना गेल्या चाळीस वर्षांत किती तरी पिढ्यांना तेवढीच मजा आली. आजच्या पिढीच्या नचिकेत खासनीसचा अनुभवही काही वेगळा नाही. हा सिनेमा त्याचा अगदी फेवरिट आहे. या सिनेमातली सिनेमॅटिक लिबर्टी या शब्दालाही लाजवणारी सिनेमॅटिक लिबर्टी, पटकथा लेखकाची अफाट कल्पनाशक्ती यांना सलाम करीत नचिकेत आजही या चित्रपटाचा निखळ आनंद घेताना दिसतो.
‘जुना सिनेमा’ या सर्वांच्या लेखणीतून व ‘आताच्या चष्म्यातून’ सविस्तर वाचायला मिळणारच आहे. त्यामुळं त्यातल्या तपशिलात फार न जाता, या प्रयोगाविषयी सांगायला हवं. या प्रयोगात लेखकांनी निवडलेले चित्रपट १९५७ ते १९९८ या चार दशकांतले आहेत. गुरुदत्तचा ‘प्यासा’ ते एन. चंद्राचा ‘वजूद’ अशी ही दोन टोकं आहेत. यातले बहुतेक सिनेमे माइलस्टोन म्हणूनच गणले गेले आहेत. त्यामुळं मुळ‌ात आधी या चित्रपटांनी आपली गुणवत्ता त्या त्या काळात सिद्ध केलेलीच आहे. ‘प्यासा’सारखा चित्रपट तर केवळ भारतीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही सार्वकालिक अभिजात चित्रपट म्हणून नोंदला गेला आहे. ‘छोटी सी बात’, ‘अमर, अकबर, अँथनी’, ‘अर्थ’ आणि ‘वजूद’ यासारखे चित्रपट संबंधित दिग्दर्शकांच्या कारकिर्दीतील माइलस्टोन म्हणून पूर्वीच ओळखले जात आहेत. अशा स्थितीत २०१९ मध्ये (म्हणजे यातला शेवटचा चित्रपट प्रदर्शित होऊनही २१ वर्षे झाल्यावर) नव्या पिढीला, म्हणजे साधारण विशीपासून ते चाळिशीपर्यंत असलेल्या पिढीला ते कसे वाटतात, हे पाहणे औत्सुक्याचे होते. यातील बहुतेक लेखकांनी त्यांच्या जन्माच्या साधारणत: वीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे रसग्रहण केले आहे. हे लक्षात घेतले म्हणजे त्यांच्या नजरेतून या चित्रपटांकडे नव्याने बघणे का महत्त्वाचे आहे, हे लक्षात येईल. अपेक्षेप्रमाणे हे सर्वच चित्रपट नव्या पिढीलाही तितकेच आवडलेले दिसतात. त्यांचं या चित्रपटांकडे पाहणं कुतूहलाचं, औत्सुक्याचं, तर काहीसं कौतुकाचंही आहे. 
या चित्रपटांचा काळ लक्षात घेतला, तरी या चाळीस वर्षांत आपल्या देशात झालेलं स्थित्यंतर आपल्या सहज लक्षात येईल. ‘प्यासा’ प्रदर्शित झाला, तेव्हा पंडित नेहरू देशाचे पंतप्रधान होते, तर ‘वजूद’ प्रदर्शित झाला, तेव्हा अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. या ४० वर्षांत मिश्र समाजवादी अर्थव्यवस्थेकडून जागतिकीकरण स्वीकारल्यानंतरच्या भांडवलवादी अर्थव्यवस्थेपर्यंतचा प्रवास देशानं पूर्ण केला होता. ऐंशीच्या दशकात आलेल्या ‘छोटी सी बात’, ‘घरोंदा’ आदी चित्रपटांनी त्या त्या वेळची सामाजिक परिस्थिती चपखलपणे मांडली होती. याच दशकातल्या ‘अमर अकबर अँथनी’नं सर्वाधिक करमणुकीची नाममुद्रा आपल्या नावावर केली होती. ‘अर्थ’ आणि ‘इजाजत’मध्ये पुरुषप्रधान संस्कृतीचं आणि आधुनिक स्त्रीच्या आत्मभानाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. यातले काही सिनेमे सुप्त आशयातून, काही थेट कथानकातून, तर काही गीत-संगीताच्या माध्यमातून आपला वेगळेपणा सिद्ध करीत होते. अशा चित्रपटांविषयीचं कुतूहल सार्वकालिक असू शकतं. नव्या पिढीच्या चष्म्यातून या सिनेमांकडं पाहताना त्यांच्या आशयातला हा कालातीतपणा तपासणं हाही एक उद्देश असतोच. याशिवाय पूर्वी न जाणवणारी काही नवी वैशिष्ट्यं, काही वेगळेपणा, नवी सौंदर्यस्थळं नव्या पिढीला जाणवतात काय हेही पाहता येतं. या सर्व सिनेमांबाबत असं काही ना काही तरी गवसल्याचं या सर्व लेखांमधून प्रत्ययाला येतं.
चित्रपटासारख्या कलाप्रकाराला नाटकाप्रमाणे ‘पुढील प्रयोगात दुरुस्ती’ची संधी नसते. त्यामुळं चित्रपटात राहिलेली एखादी चूक कायमची तशीच राहू शकते. (क्वचितप्रसंगी तो भाग एडिट केला जातोही.) मात्र, अशी एखादी चूक, एखादी विसंगती, कथाप्रवाहातील किंवा संकलनातील दोष नंतरच्या काळात अभ्यासकांना नक्कीच आढळू शकतो. त्यावर चर्चाही होऊ शकते. विशिष्ट कलाकारांची निवड, त्यांची अभिनय पद्धती याविषयीही नव्या पिढीची काही तरी गमतीदार निरीक्षणं असू शकतात. त्या काळात लिहिले गेलेले संवाद, त्यातून प्रकटणारी त्या काळातील समाजाची मानसिकता यातही आजच्या पिढीला विसंगती आढळूच शकते. अशा सगळ्या गमतीजमतींसह या जुन्या सिनेमांकडं नव्या पिढीच्या चष्म्यातून पाहणं हा वाचकांसाठीही एक वेगळा, समृद्ध करणारा अनुभव ठरू शकतो.
चित्रपटांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं प्रदीर्घ काळ जतन करता येणं शक्य आहे. आता तर अत्याधुनिक, डिटिजल माध्यमामुळं चित्रपट अक्षरश: ‘अमर’ झाले आहेत. आपल्याकडं चित्रपटसृष्टी सुरू झाली, तेव्हा तयार झालेला पहिला मूकपट आपण आजही पाहू शकतो. आता तर तंत्रज्ञान पुष्कळ पुढं गेल्यानं तयार झालेले सगळेच्या सगळे चित्रपट आपल्याला जतन करून किती तरी वर्षं जपून ठेवता येणं शक्य आहे. त्या त्या काळाचा आरसा किंवा त्या काळाचा तुकडाच या चित्रपटांच्या रूपानं पुढच्या पिढ्यांना पाहायला मिळणार आहे. तेव्हा आणखी शंभर वर्षांनी कुणी आजच्या चित्रपटांबाबत असा प्रयोग करून पाहू शकेल, ही शक्यता अजिबातच नाकारता येत नाही. हे चक्र पुढं कित्येक काळ चालूच राहील, यात शंकाच नाही. 
अर्थात आपण आजच्या काळात असल्यानं आजची मजा लुटू या. या उत्तम सिनेमांकडं नव्या पिढीनं कसं पाहिलंय ते त्यांच्या लेखांतून अनुभवू या. हे सिनेमे पुन्हा पाहताना आपल्यालाही नवं काही गवसलं तर हा खटाटोप सार्थकी लागेल. 

---

(पूर्वप्रसिद्धी : संवादसेतू दिवाळी अंक, २०१९)

---

23 May 2020

मनशक्ती युवा दिवाळी अंक २०१८ लेख

फुलपाखरू
---------------


शाळेत सहलीची घोषणा झाली आणि सायलीच्या मनात फुलपाखरं उडू लागली. तिला भटकायला आवडे. सायलीचे बाबा उत्तम ट्रेकर होते. बाबांसोबत ती अनेकदा ट्रेकला जाई. मात्र, शाळेच्या ग्रुपबरोबर सहलीला जायची मजा काही औरच होती. या वर्षी आठवीत असलेल्या सायलीची सहल देवबन इथं जाणार होती. यंदा शाळेची ही कदाचित शेवटचीच सहल, कारण नववी आणि दहावीच्या मुलांना सहलीला नेत नाहीत. त्यामुळं या सहलीला जायचंच असं सायलीनं ठरवलं. 
पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर सह्याद्रीच्या डोंगरांच्या सांदीत ही देवराई होती. तिथूनच नंदिनी नदीचा खळाळता प्रवाह जात होता आणि खाली पठारावर उतरून विशाल रूप धारण करत होता. देवबनला एका खासगी उद्योजकानं सुंदर रिसॉर्ट बांधलं होतं. त्या रिसॉर्टमध्येच सायलीचा वर्ग उतरणार होता. सायलीच्या सगळ्या मैत्रिणीही सहलीला येणारच होत्या. पण तिची लाडकी मैत्रीण इरा नेमकी त्याच काळात तिच्या मावसबहिणीच्या लग्नाला दिल्लीला जाणार होती, त्यामुळं सायली जरा हिरमुसलीच. इराची सोबत नसेल तर सहलीत मज्जा येणार नाही, असं तिला वाटत होतं. पण अखेर इरानंच तिची समजूत काढली आणि अखेर सायली इराशिवाय सहलीला जायला तयार झाली. खूप लहानपणी सायली बाबांसोबत त्या देवराईच्या जवळच असलेल्या माधवगड किल्ल्यावर गेली होती. मात्र, त्या वेळी ही देवराई पाहायचं राहून गेलं होतं. सायलीच्या दुसऱ्या दोन मैत्रिणी राधा आणि अनुष्काही येणार होत्या. त्यामुळं सायलीला जरा बरं वाटलं. सहल शुक्रवारी रात्री पुण्यातून निघणार होती आणि रविवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परत पुण्यात येणार होती.
सहलीला चार दिवस राहिले, तशी सायलीची लगबग सुरू झाली. सायलीच्या आईनं तिच्या इतर मैत्रिणींच्या आयांबरोबर पुन्हा एक वेगळा 'देवबन ट्रिप' नावाचा व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला आणि त्यावर सहलीच्या तयारीचं नियोजन सुरू केलं. आईच्या या अतिउत्साहाचा सायलीला कधी कधी वैताग येतो. आता आपण काही लहान बाळ नाही आहोत, असं तिला वाटतं. पण तिच्या आईला ते काही पटत नाही. सायलीचे खास ट्रिपचे कपडे, शॉर्ट, शूज, गरम कपडे, थर्मास, चाकू, दुर्बिण, दोरी, छत्री इ. सारा जामानिमा तिच्या बॅकपॅकमध्ये गेला. मोबाइल, हेडफोन्स, इअरफोन्स, पॉवर बँक, कोरडा खाऊ, पाण्याची बाटली या सगळ्या जीवनाश्यक वस्तू हँडबॅगमध्ये गेल्या. सायलीचे बाबा तिला शाळेपर्यंत सोडायला आले. रात्री अकराची वेळ होती आणि जानेवारीतली पुण्यातली थंडी होती. सगळे जण कुडकुडत होते. शाळेच्या बाहेर चहाची एक टपरी अजून चालू होती. सगळ्यांनी तिथं जाऊन आधी गरमागरम चहाचा आस्वाद घेतला... अजून मुलं येत होती. सायलीचे बाबा थांबणार होते, पण सायलीच त्यांना जा म्हणाली. बाबांनी आता हे आपल्याला असं लहान बाळासारखं वागवणं थांबवावं, असं तिला मनोमन वाटे. कधी कधी बाबांचाही राग येई. शेवटी सायलीचे बाबा आणि तिच्या इतर मैत्रिणींचेही बाबा त्यांना 'टाटा, काळजी घ्या सगळे, पाण्यात जाऊ नका' असं सांगून घरी परतले... आता सायलीला एकदम 'हुश्श' झालं... आता खऱ्या अर्थानं ट्रिप सुरू झाल्यासारखं वाटू लागलं. 
हळूहळू सगळी मुलं जमली. सायलीच्या मैत्रिणींनी बसमध्ये एकाच बाकावर जागा पटकावली. रात्री बाराच्या सुमारास बस निघाली. 'गणपतीबाप्पा मोरया'चा गजर झाला आणि प्रवास सुरू झाला. मुलं सुरुवातीला दंगा करीत होती. गाण्याच्या भेंड्या सुरू झाल्या. पण शेवटी दोन वाजून गेले तशी एकेकाला झोप यायला लागली. गाडी अजून मारुतीच्या घाटातच होती. अजून बराच वेळ होता. पौर्णिमा जवळ आली होती. बाहेर लख्खं चांदणं पसरलं होतं. चंद्राचा पांढुरका दुधी प्रकाश सर्व आसमंतावर पडला होता. सगळीकडं चांदीचा महासागर पसरलाय असं वाटत होतं. सायलीला झोप येत नव्हती. राधा आणि अनुष्का तिच्या खांद्यावर मान टाकून झोपल्या होत्या. सायलीला इराची आठवण येऊ लागली. त्या दोघी एकच इयरफोन दोघींच्या कानाला लावून नेहमी गाणी ऐकत. सायलीनं मोबाइलला इयरफोन लावला. फेवरिट प्ले-लिस्टमधली तिची आवडती गाणी ऐकायला सुरुवात केली. अरिजित, राहत फते अली आणि श्रेयाची गाणी ऐकता ऐकता हळूहळू तिलाही शांत झोप लागली. अचानक धक्क्यानं जाग आली तेव्हा कळलं, की राधा आणि अनुष्का तिला हलवून उठवतायत. गाडी देवबनला पोचली होती. म्हणजे खरं तर देवबनच्या फाट्याला... तिथं एक तिठा होता. एक रस्ता सरळ पुढं कोकणात उतरत होता, तर देवबनला डावीकडं वाट होती. त्या तिठ्यावरच्या चहाच्या टपरीत सगळ्यांनी पुन्हा एकदा चहा घेतला. चहाच्या घोटानं सायलीला एकदम तरतरी आली. आता सगळे पाठीवर सॅक टाकून देवबनच्या वाटेकडं निघाले. पहाटेचे पाच वाजले होते. अजून अंधार होता. चंद्रप्रकाशात तो अरुंद डांबरी रस्ता एखाद्या सुस्त पडलेल्या अजगरासारखा दिसत होता. पहाटेच्या उत्साहात सगळ्यांनी भराभरा चालायला सुरुवात केली. सायलीनं आता त्या स्वच्छ हवेतला वास छातीत आतपर्यंत भरून घेतला. आजूबाजूला सगळं हिरवंगार होतं. भातशेतीचा आणि हिरव्या झुडपांचा असा तो मिश्र वास तिच्या नाकात शिरला आणि तिला वेडावल्यासारखं झालं. पुढं एक ओढा लागला. त्यावर एक साकव होता. सगळ्यांनी तिथं ओढ्यात दंगा करायला सुरुवात केली. सायलीच्या लाडक्या रानडे बाई सगळ्यांना लटकेच रागावल्या. मग मुलं जराशी खट्टू होऊनच तिथून पुढं निघाली. 
आता थोडं थोडं उजाडू लागलं होतं. ओढा संपल्यावर डाव्या बाजूला एक निमुळती पायवाट फुटली होती. त्या पायवाटेच्या तोंडावर एक रानफुलांचं झाड होतं. त्यावर एक मोठ्ठं फुलपाखरू बसलं होतं. ब्लू मॉरमॉन... सायलीनं लगेच ओळखलं. तिला फुलपाखरांचा खूप छंद होता. एकूणच कीटकांविषयी तिला अतिशय कुतूहल होतं. पुढं मोठं झाल्यावर कीटकशास्त्रज्ञ व्हायचं, असंच तिनं मनोमनी ठरवलं होतं. ते ब्लू मॉरमॉन पाहताच सायलीला खुळावल्यागत झालं. ती हळूच त्या फुलपाखराच्या दिशेनं पुढं झाली. तिला त्याचा फोटो काढायचा होता. सायली जवळ येताच फुलपाखराला चाहूल लागली आणि ते उडालं. सायलीला हसू आलं. 'अरे थांब सोन्या, मी काही करणार नाहीय तुला' असं म्हणत ती पुढं गेली. फुलपाखरू आणखीनच उडत उडत पुढं निघालं. सायली त्याच्या मागे धावली. ती निमुळती पायवाट पुढं आणखीनच अरुंद होत एका ठिकाणी नाहीशीच झाली होती. फुलपाखरू स्वच्छंदपणे उडत पुढं निघालं होतं. सायली भान हरपून त्याच्या मागं धावत होती. आता वाट बरीच मागं राहिली. ते फुलपाखरूही एका मोठ्या झाडाच्या खोडावर जाऊन बसलं. सायली दबक्या पावलांनी तिथं गेली. तिथं कॅमेरा झूम केला आणि क्लिक केलं. फोटो पाहिला. ते फुलपाखरू आता नीटच कॅमेऱ्यात कैद झालं होतं. सायलीनं मागं पाहिलं आणि तिच्या एकदम लक्षात आलं - ती त्या जंगलात एकटीच उभी आहे. फुलपाखराच्या मागं धावताना ती बरीच आत आली होती आणि आता ती नेमकी कुठं आहे हेच तिच्या लक्षात येत नव्हतं. तिनं मोबाइल पाहिला. रेंज पूर्णपणे गेली होती. सायलीला एक क्षण एकदम खूप भीती वाटली. तिनं आता नीट लक्ष देऊन आजूबाजूला पाहिलं. उंच उंच झाडं होती खूप तिथं. पाखरांचा किलबिलाट ऐकू येत होता. जंगलाची म्हणून एक शांतता असते. ती सगळीकडं पसरली होती. सायलीनं शांतपणे विचार केला. आल्या वाटेनं परत जाऊ म्हणून ती परत फिरली. आपल्या शूजच्या खुणा कुठं कुठं दिसताहेत हे ती पाहू लागली. पण खाली सगळीकडं गवत आणि पानं होती. त्यावर बुटांच्या खुणा दिसत नव्हत्या. आत्ता पावसाळा नव्हता. त्यामुळं चिखलही नव्हता. सगळी जमीन कोरडी होती. तिनं काही अंतर मागे जाऊन पाहिलं. पण तिला काही समजेना. आता बऱ्यापैकी उजाडलं होतं आणि सगळीकडं नीट दिसत होतं, एवढाच काय तो दिलासा होता. तिला परतीचा रस्ता सापडेना, तसं तिनं जोर लावून 'राधा...', 'अनू...' अशा हाका मारायला सुरुवात केली. पण कुठूनही काही प्रतिसाद आला नाही. आपण बरोबर नाही, हे लक्षात आल्यावर राधा आणि अनू रानडे बाईंना नक्की सांगतील, असं तिला वाटत होतं. तिच्या सॅकमध्ये बिस्किटांचा पुडा होता आणि पाण्याची बाटलीही होती. तिला एकदम पोटात खड्डा पडल्यासारखं झालं. तिनं पटकन तो पुडा फोडला आणि दोन बिस्किटं भराभरा खाल्ली. पाणी प्यायली. पुन्हा तिनं चारही दिशांना थोडं थोडं अंतर जाऊन पाहिलं. पण आपण नक्की कुठून इथं आलो हे काही तिला कळेना. एका वडाच्या झाडाखाली एक मोठा दगड होता. शिळेसारखा... वर थोडी सपाट जागा होती. सायली तिथं जाऊन बसली. तिला एकदम रडायला यायला लागलं. आईची, बाबांची खूप आठवण आली. पण ती लगेच सावरली. 'एवढं काही नाही झालेलं... आपण हरवलो आहोत आणि आपल्याला कुणी तरी शोधेलच, नाही तर आपण रस्ता शोधू,' असं तिनं स्वतःला बजावलं. सायलीचं वय अवघं तेरा वर्षं... या एवढ्याशा आयुष्यात तिनं किती तरी स्वप्नं पाहिली होती. हल्ली तिला आई-बाबांचा जरा राग येत असला, तरी तेच तिचं सगळं विश्व होतं. आणि हो, इरा... इरा ही तिची अत्यंत लाडकी मैत्रीण म्हणजे तिचा जीव की प्राण होती. 
सायलीनं शांतपणे विचार केला. आता जास्तीत जास्त काय होऊ शकतं? आपल्याला न घेता तर हे लोक नक्की जाणार नाहीत. एव्हाना त्यांना कळलंही असेल, की मी हरवलेय म्हणून... सगळे शोधत असतील. शिवाय मोबाइलला इथं रेंज नाही. पण थोडं फार इकडं तिकडं गेलं तर, विशेषतः उंचावर गेलं तर रेंज येईल... हे लक्षात आल्यावर तिला एकदम हुशारी वाटली. तिनं पुन्हा आजूबाजूला पाहिलं. तसा उंच भाग कुठं जवळ दिसत नव्हता. सगळी सपाटीच होती. पुन्हा तिचं मन हिरमुसलं. या जंगलात कुठले हिंस्र प्राणी नसतील ना? सायलीच्या मनात अचानक हा विचार आला आणि ती एकदम धास्तावली. तसा कुठला प्राणी समोर आला - म्हणजे बिबट्या किंवा तरस किंवा रानगवा तर जाऊच द्या - अगदी कोल्हा किंवा लांडगा जरी समोर आला, तरी आपली काही धडगत नाही, असं तिला वाटून गेलं. तिच्याकडं एक छोटी सुरी सोडली, तर कुठलंही हत्यार नव्हतं. शिवाय सरपटणारे प्राणीही धोकादायकच असतात. सायली दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून छातीजवळ घेऊन बसली. गुडघ्यांवर हनुवटी टेकवून ती समोर पाहत बसली. आणि पाहते तो काय... समोरच्या एका दगडावर खाली तेच फुलपाखरू बसलेलं... ब्लू मॉरमॉन... आता मात्र तिला त्या फुलपाखराचा खूप राग आला. त्याच्या नादापायीच ती रस्ता चुकली होती. मग एकदम तिच्या लक्षात आलं, या जंगलात तिनं अद्याप दुसरा कुठलाही जिवंत प्राणीच पाहिला नव्हता. ते फुलपाखरू सोडून... खरं तर ते फुलपाखरू म्हणजे तिच्या सोबतीला असलेला एकमेव जीव होता. सायलीला एकदम भरून आलं. तिला ती रोज रात्री आईच्या कुशीत शिरून कशी बिनधास्त झोपायची, याची आठवण आली. त्या फुलपाखराला आपल्याला काही तरी सांगायचंय असं तिला वाटू लागलं. तिच्या एवढ्याशा आयुष्याचा ती परत विचार करू लागली. आपणही त्या फुलपाखरासारखेच स्वच्छंदी आहोत आणि ते आत्ता एकदम कसं एकटं आहे, तसेच आपणही एकटेच आहोत, हे तिच्या एकदम लक्षात आलं. आपले आई-वडील, इरा, राधा, अनुष्का, रानडे बाई असं कोणी कोणी आत्ता आपल्याजवळ नाहीय आणि तरीही आपण आहोत. जिवंत आहोत, श्वास घेत आहोत. आपल्या पुढच्या आयुष्यातही असंच असेल कदाचित! सोबत कुणी नसेलही, पण तरीही हे फुलपाखरू कसं एकटंच मस्त उडतंय, छान जगतंय तसं आपल्याला जगायला हवं, असं काही तरी तिला वाटून गेलं. ती अगदी हळूच त्या फुलपाखराजवळ गेली... पण ते परत उडालं... एका दिशेला उडत राहिलं... सायली त्याच्या मागे धावत राहिली... खूप वेळ गेला... फुलपाखरू पुढं आणि सायली मागं.... अखेर पाण्याचा आवाज येऊ लागला. सायलीच्या एकदम लक्षात आलं, की आपण ओढ्याच्या जवळ आलो आहोत. तिनं फुलपाखरावरची नजर एक मिनिट हटविली आणि डावीकडं पाहिलं... तिला ओढा व तो पूल दिसला. तिनं पुन्हा समोर पाहिलं तर फुलपाखरू नव्हतंच. एकदम गायब... 
सायली थक्क झाली. ते ब्लू मॉरमॉन कुठं गेलं असेल, याचा ती विचार करीत राहिली. तेवढ्यात तिला एकदम तीन फुलपाखरं उडताना दिसली. त्यात तिचं फुलपाखरू होतं... म्हणजे ते त्या फुलपाखराचे आई-बाबा होते? होय, होय! त्या बाळाला त्याचे आई-बाबा सापडले होते. सायलीला खूप आनंद झाला. तिनं जागेवरच उंच उडी मारली. आता तिला खरोखरच तिच्या आई-बाबांची आठवण आली. आपण आपल्या आई-वडिलांना किती गृहीत धरतो ना, की ते आहेतच सदैव म्हणून... उद्या ते नसतीलच तर... आपण आत्ता हरवलो, तसे ते हरवले तर? सायली या विचारानं एकदम दचकली. तिनं मनोमन निश्चय केला, की आता आई-बाबांचं सगळं ऐकायचं. ते म्हणतील तसं वागायचं... एकदम शहाण्या मुलीसारखं! 
तेवढ्यात तिचा मोबाइल खणखणला. सायली 'रेंज'मध्ये आली होती. तिच्या आईचाच फोन होता. पलीकडून आई व बाबा दोघंही बोलत होते - 'बेटा, कशी सुरू आहे ट्रिप? नीट पोचलीस ना? वेळेवर जेव... नीट जा, नीट ये... दंगा करू नकोस...'
इकडं सायलीच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंच्या धारा सुरू होत्या.... ती नुसती 'हो, हो' म्हणत होती... हसत होती...
अन् वर आकाशात तीन फुलपाखरं मस्त विहरत होती!!

---
 
(पूर्वप्रसिद्धी ः मनशक्ती युवा दिवाळी अंक, २०१८)