26 Jun 2020

दृष्टी-श्रुती दिवाळी १९ - लेख - भाग ३


नव्वदचं दशक - 'अस्वस्थ' ते 'आश्वस्त'...
---------------------------------------------

भाग ३
--------

माझं तिसरं आणि (कदाचित शेवटचं मोठं) स्थित्यंतर १९९७ या वर्षानं घडवून आणलं. मी नगर कायमचं सोडलं आणि 'पुणे लोकसत्ता'त रुजू झालो. त्यामागं काही कारणं होती. छोट्या तलावात मी राहू नये, असं माझ्या गुरुजींना वाटत होतं. त्यांचा सल्ला मी ऐकला आणि पुण्यात आलो. तिथं आल्यानंतर दीडच महिन्यात माझी 'सकाळ'मध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून निवड झाली. 'सकाळ'तर्फे तेव्हा रीतसर प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. 'सकाळ'तर्फे ही दीर्घ काळानं केली जात असलेली भरती होती, असंही कळलं. 'सकाळ'शेजारी असलेल्या एच. व्ही. देसाई कॉलेजात आम्हाला शंभर मार्कांचा पेपर देण्यात आला होता व त्या कॉलेजच्या वर्गात बसून तीन तासांत आम्ही तो पेपर सोडवला होता. या परीक्षेला खूप लोक आले होते. त्यात अनेक सीनियर मंडळीही दिसत होती. माझा डिप्लोमा अर्धवट सुटल्यानं मी १९९६ मध्ये नगरला न्यू आर्टस कॉलेजमध्ये असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या केंद्रात बी. ए.च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता. 'सकाळ'च्या परीक्षेत मी पहिला आलो आणि तिथं माझी प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून निवड झाली. एक सप्टेंबर १९९७ रोजी मी 'सकाळ'मध्ये रुजू झालो. माझ्यासोबत श्रीपाद कुलकर्णी, मंदार कुलकर्णी, संजय आवटे, संजीव ओहोळ व सूरश्री चांडक असे पाच जण होते. आम्ही रुजू झालो, त्याच्या आदल्याच दिवशी लेडी डायनाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्याचीच ठळक बातमी अंकात होती. मी पहिल्याच दिवशी 'सकाळ'च्या ग्रंथालयात जाऊन माणूस चंद्रावर उतरला त्या दिवशीचा अंक पाहायला मागितला. तेव्हाचे ग्रंथपाल सुरेश जाधव यांनीही तत्परतेनं मला तो अंक काढून दाखवला होता. 'लोकसत्ता'तले विनायक लिमये यांच्या ओळखीनं भाऊमहाराज बोळात ओक वाड्यात कॉट बेसिसवर मी राहत होतो. तिथून मी अरोरा टॉवर्सला 'लोकसत्ता'च्या ऑफिसात सायकलवर जात असे. आता 'सकाळ'चं ऑफिस एकदमच जवळ आलं. मी तर अनेकदा तुळशीबाग, जोगेश्वरीच्या बोळातून चालत ऑफिसात जात असे. तेव्हाचे सहसंपादक राजीव साबडे यांच्या हाताखाली आमचं प्रशिक्षण सुरू झालं. इथून पुढं मी खऱ्या अर्थानं 'बातमी'शी जोडला गेलो. या दिवसानंतरच्या प्रत्येक मोठ्या घडामोडीचा मला या ना त्या प्रकारे साक्षीदार होता आलं. त्यावर लिहिता आलं. 
सन १९९७ या वर्षी भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. तेव्हा रूमवर राहत असताना मी पहिल्यापासून सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स व टाइम्स ऑफ इंडिया हे चार पेपर रोज घ्यायचो. (ही परंपरा आजही चालू आहे.) त्या वर्षी 'टाइम्स ऑफ इंडिया'नं १५ ऑगस्टला शंभर पानांचा बंपर अंक काढला होता. तो अंक आणि त्यातल्या अत्याधुनिक जाहिराती पाहून माझे डोळे विस्फारले होते. आपल्या आजूबाजूचा भवताल वेगानं बदलत असल्याची त्या जाहिराती ही ठळक खूण होती. दुसरीकडं कुसुमाग्रजांची 'स्वातंत्र्यदेवीची विनवणी' ही कविता आमच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती आणि तीही अफाट लोकप्रिय झाली होती. तेव्हा ही कविता सर्व शासकीय कार्यालयांत लावण्याचं फर्मान तेव्हाच्या राज्य सरकारनं काढल्याचं आठवतं. बाकी 'टाइम्स'च्या जाहिरातींतल्या सगळ्याच गोष्टी आमच्यापर्यंत आल्या नसल्या, तरी महानगरांमध्ये हा बदल घडतोय हे आम्हाला दिसत होतं. याच वर्षी दिल्लीत पहिला मॉल आणि पीव्हीआर हे पहिलं मल्टिप्लेक्स उभारण्यात आलं. पुणंही झपाट्यानं बदलत होतंच. पुण्याची वस्ती आता चहूबाजूंनी वाढत होती. मी १९९७ मध्ये बहुसंख्य ठिकाणी सायकलवरूनच बातमीदारी केल्याचं मला आठवतंय. मात्र, १९९४ ला बालेवाडी स्टेडियम उभं राहिलं आणि कात्रज-देहूरोड बायपासच्या दोन्ही बाजूला तेव्हा वैराण माळरान होतं, ते हळूहळू इमारतींनी व्यापू लागलं. यश चोप्रांच्या 'दिल तो पागल है'नं याच वर्षी आम्हाला 'पागल' करून टाकलं होतं. नायिकांचे कपडे तोकडे होत चालले होते. शहरांमध्ये त्या फॅशनचं प्रतिबिंब आता लगोलग पडलेलं दिसू लागलं होतं. मोबाइलनं सर्व जग व्यापण्यापूर्वी पेजर नावाचा एक प्रकार याच काळात आला आणि धुमकेतूसारखा अंतर्धानही पावला. 'सकाळ'मध्ये नोकरीचे सुरुवातीचे दिवस मी फार एंजॉय केले. मी, मंदार, श्रीपाद आम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीचा कंटाळा नसायचा. आम्ही बॅचलर व रूमवर राहणारे असल्यानं दिवसाचा बराच काळ ऑफिसमध्येच पडीक असायचो. कुठलंही काम करायला आम्ही नाही म्हटलं नाही. गावभर फिरायचो. जवळपास प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम अटेंड केलाच पाहिजे, असं आम्हाला वाटायचं. आम्ही छोट्या शहरांतून आलेली मुलं होतो. आमचं सांस्कृतिक कुपोषण लपलेलं नव्हतं. मग आम्ही पुण्यात आल्यावर या गोष्टी भरभरून लुटायला सुरुवात केली. सवाई गंधर्व, 'बालगंधर्व'ची नाटकं, मंगला किंवा 'प्रभात'चे सिनेमे, एनएफएआयमधले वेगळे सिनेमे यातलं काही आम्ही चुकवलं नाही. 'सकाळ'मध्ये अगदी सुरुवातीलाच 'झलक' हे सांस्कृतिक डायरीचं काम माझ्याकडं आलं. त्यानिमित्तानं शहरातल्या सांस्कृतिक वर्तुळातील बहुसंख्य लोकांची ओळख झाली, ती आजतागायत टिकून आहे. 'सकाळ'चा रुबाब पुण्यात तेव्हा एवढा होता, की 'सकाळ'चा बातमीदार येतोय म्हणून पत्रकार परिषदा थांबलेल्या आहेत. मी स्वतः याचा अनेकदा अनुभव घेतलाय. 'सकाळ' ही आमची 'मास्टर की' होती. 'सकाळ'मधून आलो म्हटल्यावर सगळीकडची कुलपं निघायची. आम्ही याचा चांगल्या अर्थानं भरपूर फायदा करून घेतला. आम्हाला बाकी काहीच नको होतं. आम्हाला फक्त सगळीकडं उपस्थित राहायचं होतं आणि सगळं भरभरून अनुभवायचं होतं. तेव्हाची माझी डायरी आज नुसती वाचली, तरी दमायला होतं. तेव्हा मी प्रत्यक्ष ते सगळं करत होतो. कंटाळा नावाची गोष्टच माहिती नव्हती. पण या भरभरून जगण्याची, सगळ्या चांगल्या गोष्टींचा आस्वाद घेण्याची ही जी सवय लागली, तिचा आयुष्यभर फार मोलाचा उपयोग झाला. पत्रकारिता करीत असताना सर्वांत महत्त्वाचं काय असतं, तर ते कुतूहल. आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टींबाबत लहान मुलासारखं कुतूहल पाहिजे. माझ्या ठायी ते भरपूर होतं आणि त्यामुळंच मला भरपूर बघावंसं वाटायचं, लिहावंसं वाटायचं. तेव्हाचं हे संचित पुष्कळ पुरलं. 
बघता बघता १९९८ उजाडलं. आमच्या ऑफिसमध्ये मार्च महिन्यात आणखी २२ जणांची 'मेगाभरती' झाली. आम्ही लगेच 'सीनियर' झालो. हा सगळा शिकण्याचा काळ होता, जडणघडणीचा काळ होता. ऑफिसमध्ये वरिष्ठ सांगतील ती प्रत्येक गोष्ट आम्ही केली. आजूबाजूचं जग बदलत होतं. लोक सढळ हातानं खर्च करताना दिसत होते. पुणे ते मुंबई एक्स्प्रेस-वे बांधायचं बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. या एक्स्प्रेस-वेच्या कामाचा शुभारंभ याच वर्षात झाला. तेव्हाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी हे काम वेगात पूर्ण करायचं ठरवलं. त्यांनी मुंबईतही ५५ उड्डाणपूल बांधल्यानं लोक त्यांना 'ब्रिज'भूषण गडकरी म्हणायला लागले होते. याच वर्षी केंद्रातलं (देवेगौडा जाऊन आलेलं) गुजराल सरकार कोसळलं आणि पुन्हा निवडणुका झाल्या. या वेळी लोकांनी वाजपेयींच्या बाजूनं झुकतं माप दिलं. तरीही त्यांना माया, ममता व जयललिता या तिघींचा पाठिंबा घ्यावा लागला. मार्च १९९८ मध्ये वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि सोनिया गांधी विजनवासातून बाहेर येऊन प्रथमच काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. तेव्हा 'सकाळ'मध्ये या दोघांविषयीचा माहितीपर लेख लिहिण्याची संधी मला मिळाली. 
एप्रिलमध्ये शारजात सचिन तेंडुलकर नावाचं वादळ आलं आणि त्यानं शेन वॉर्नच्या ऑस्ट्रेलियाचा दोनदा कचरा करून, भारताला अजिंक्यपद मिळवून दिलं. पंचविशीचा हा तरुण आता देशाचा 'यूथ आयकॉन' झाला होता. दोन वर्षांपूर्वीच इंग्लंड दौऱ्यात आणखी दोन हिरे भारतीय संघाला गवसले होते. राहुल द्रविड आणि सौरभ गांगुली... १९९६ च्या वर्ल्ड कप सेमीफायनलला रडणारा भारत आता दिसत नव्हता. उलट सचिनच्या त्या 'डेझर्ट स्टॉर्म' म्हणून नंतर प्रसिद्ध पावलेल्या दोन झंझावाती शतकांनी सगळा माहौलच बदलवून टाकला. याच वर्षात करण जोहर नामक दिग्दर्शकाचा 'कुछ कुछ होता है' हा सिनेमा आला आणि या चित्रपटानं भारतीय चित्रपटसृष्टीतील मनोरंजनाचे सगळे आयामच बदलले. 'कुछ कुछ' तुफान हिट झाला. 'राहुल' आणि 'अंजली' घराघरांत पोचले. याच काळात भारतात पेप्सी आणि कोला या अमेरिकी जायंट शीतपेय कंपन्यांचं 'युद्ध' सुरू झालं होतं. क्रिकेट संघाच्या स्पॉन्सरशिपपासून ते रस्त्यावरच्या बसस्टॉपवरील होर्डिंगपर्यंत सगळीकडं पेप्सी किंवा कोका-कोला दिसायला लागले होते. ही शीतपेयं पिणं म्हणजे 'कूल' असणं असं समस्त तरुणाईला वाटायला लागलं होतं. 'लहर पेप्सी'च्या जाहिरातीत 'आहा' म्हणत रेमो फर्नांडिस आणि जूही चावला नाचू लागले होते. जागतिकीकरण स्वीकारल्याच्या घटनेला आता सात-आठ वर्षं उलटून गेली होती आणि सरकारं बदलली तरी धोरण बदललं नव्हतं. देशाचा सुस्त पहुडलेला हत्ती भांडवलवादी अर्थव्यवस्थेमुळं हळूहळू हालचाल करायला लागला होता. याच वर्षी मे महिन्यात पोखरणमध्ये भारताने पाच अणुचाचण्या केल्या. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या अणुचाचण्यांद्वारे पंतप्रधान वाजपेयींनी जगाला भारताच्या सामर्थ्याची पुन्हा एक चुणूक दाखविली होती.
सन १९९९. या वर्षी एक मार्च रोजी आम्ही 'सकाळ'मध्ये परमनंट झालो. आयुष्याची इतिकर्तव्यता झाली, असं वाटायचा तो काळ होता. दीड वर्ष राबल्यावर आम्ही कायम झालो होतो, त्यामुळं असं वाटणं स्वाभाविक होतं. याच वर्षात मे महिन्यात मी माझ्या बी. ए.च्या तिसऱ्या वर्षाची परीक्षा दिली आणि फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. आता मला आणि मंदारला रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेची पदवी घेण्याचे वेध लागले होते. त्याप्रमाणे आम्ही जूनमध्ये या कोर्सची प्रवेश परीक्षा दिली. तेव्हा आमच्या सुदैवानं अरुण साधू या विभागाचे प्रमुख होते. त्यांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला आणि कोर्ससाठी आमची निवडही केली. या कोर्ससाठी मी दाखल झालो, हा आयुष्यातला आणखी एक महत्त्वाचा टप्पा. वयाची चोविशी आली, तरी माझं शिक्षण सुरूच होतं. पण एकीकडं नोकरी करत असल्यानं हा सगळा प्रवास आता आनंददायी वाटत होता. याच वर्षी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका झाल्या आणि वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. या वेळी मात्र त्यांना जनतेनं बऱ्यापैकी बहुमत दिलं होतं. 'रानडे'मध्ये दिवसा कॉलेज आणि दुपारी ऑफिस अशा धावपळीत हे वर्ष कसं संपलं ते कळलंही नाही. याच वर्षी सुभाष घईंचा 'ताल' प्रदर्शित झाला. राज्यात मनोहर जोशी जाऊन धडाकेबाज नारायण राणे मुख्यमंत्री झाले होते. या सरकारनं मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका जाहीर करायला लावल्या आणि त्यात युतीचा निसटता पराभव झाला. (पुढची पंधरा वर्षं राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्य केलं.) याच वर्षी जूनमध्ये शरद पवार यांनी सोनियांच्या परदेशी मूळ असल्याच्या मुद्द्यावरून स्वतंत्र 'राष्ट्रवादी काँग्रेस' हा पक्ष स्थापन केला. यामुळं राज्यातील राजकारणाचे आयामच बदलले...
...या सगळ्या वेगवान घडामोडी घडत असताना २००० हे वर्ष उजाडलं. नव्वदचं दशक संपलं होतं आणि जग या विसाव्या शतकातील शेवटच्या वर्षात शिरलं होतं. आज मागं वळून पाहताना लक्षात येतं, की आज आपला जो काही भला-बुरा पिंड घडला आहे, तो या नव्वदच्या दशकानं घडवला आहे. 'अस्वस्थ' ते 'आश्वस्त' असा हा प्रवास होता. वयाच्या चौदा वर्षांसारख्या अत्यंत अस्वस्थ, अस्थिर वयापासून ते चोविसाव्या वर्षापर्यंत, थोडक्यात आयुष्याला स्थैर्य देण्यापर्यंतचा हा प्रवास होता. माझ्यासोबत किंवा माझ्या आगे-मागे तीन-चार वर्षं जन्मलेल्या सर्वांनी या काळात असाच प्रवास केला असेल. तपशील निराळे असतील, पण आपला रस्ता हाच होता. साध्या रस्त्यावरून आपण सहापदरी एक्प्रेस-वेवर येऊन दाखल झालो होतो. आता इथं सीटबेल्ट घट्ट बांधायचे होते आणि गाडी सुसाट सोडायची होती... तोही प्रवास भन्नाटच झाला... पण त्याविषयी नंतर केव्हा तरी.. 
तूर्त मला घडविणाऱ्या आणि काही अविस्मरणीय आठवणी देणाऱ्या या दशकाबद्दल केवळ आणि केवळ कृतज्ञता!!!

(समाप्त)

---- 

दृष्टी-श्रुती दिवाळी १९ - लेख - भाग २

नव्वदचं दशक - 'अस्वस्थ' ते 'आश्वस्त'...
----------------------------------------------

भाग २
--------

सन १९९१ उजाडलं आणि आखाती युद्ध सुरू झालं. टीव्हीवर पहिल्यांदाच लाइव्ह युद्ध दिसू लागलं. अमेरिकेची ‘क्रूझ’, ‘स्कड’ ही क्षेपणास्त्रं इराकवर भूमीवर कोसळून, तो देश बेचिराख करत होती. शाळेत शिकवता शिकवता काही जाणते शिक्षक या युद्धाबद्दलही चर्चा करीत होते, अभ्यासासोबत हे युद्धही टीव्हीवर पाहा, असं सांगत होते. या धामधुमीतच दहावीची परीक्षा आली. गावातल्या भारी शाळेत परीक्षेचा नंबर आला होता. तेवढा काळ का होईना, अस्मादिकांना त्या भारी शाळेत बसायला मिळालं. तिथल्या सुंदर मुलींकडं बघता आलं, हाच काय तो भाग्ययोग! दहावीची परीक्षा संपली आणि मानेवरचं ‘जू’ उतरल्यासारखं झालं. भूगोलाचा पेपर संपल्यावर मला तातडीनं कोणता तरी सिनेमा पाहायचाच होता. तेव्हा एकही धड सिनेमा गावात लागलेला नव्हता. पण संजय दत्तचा 'फतेह' नावाचा टुकार सिनेमा पाहून आम्ही परीक्षा संपल्याचं सेलिब्रेशन केलं. सुट्टी मजेत गेली. निकाल लागला. बरे मार्क होते. ८५ टक्क्यांहून अधिक मार्क पडलेल्यांनी इंजीनिअरिंगला जायचं हा अलिखित दंडक होता. मी पण सोलापूर, औरंगाबाद आणि पुण्याच्या गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये अर्ज टाकून ठेवले होते. पण माझा चॉइस पक्का होता - पुणे! पुण्याशिवाय दुसरं शहर मी निवडणं शक्यच नव्हतं. 
माझ्या आयुष्यातलं दुसरं आणि फार महत्त्वाचं स्थलांतर घडून आलं ते जुलै १९९१ मध्ये. मी पुण्याच्या 'जीपीपी'मध्ये होस्टेलवर राहायला आलो. विशेष म्हणजे तेव्हा सत्तेवर आलेल्या पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी काम केलेल्या डॉ. मनमोहनसिंग नावाच्या नव्या अर्थमंत्र्यांनी देशाचं नशीब बदलवणारा अर्थसंकल्प याच जुलैमध्ये सादर केला होता. अर्थात तेव्हा आम्हाला त्याचं महत्त्व समजणं शक्यच नव्हतं. आम्ही आमच्या रूमवर नवी गादी, नवी बादली, नवे कपडे आणण्यात मग्न झालो होतो. थोड्याच काळात भारतात 'झी' ही पहिली खासगी दूरचित्रवाहिनी सुरू झाली. मी कॉलेज लाइफ एंजॉय करण्याच्या मूडमध्ये नव्हतो. इंजिनीअरिंग काहीही समजत नव्हतं. दहावीपर्यंतची हुशारी कुठे गेली होती, देव जाणे! शहरातल्या मुला-मुलींचा स्मार्टनेस पाहून मी दचकलो होतो, विझलो होतो; आत आत संपत चाललो होतो. नगर आणि पुण्यात जमीन-अस्मानाचा फरक होता. आमची शाळा गरिबांची होती. इथं कॉलेजच्या इमारतीपासून ते शिक्षक-शिक्षिकांपर्यंत सगळंच लई भारी! पहिलं वर्ष कॉमनच असतं. पण मला वर्कशॉपमध्ये जाऊन जॉब करायला आवडायचं. मुलींना आयते जॉब करून देणारी पोरं इथंच पाहिली. मात्र, इंजीनिअरिंगच्या संपूर्ण तीन वर्षांत एकदाही, एकाही मुलीला 'चहा घ्यायला येतेस का?' असं विचारायचाही धीर झाला नाही. तेव्हा एक रुपयाला वडा-पाव आणि एक रुपयाला फुल चहा मिळायचा. घरून पाचशे रुपये मिळायचे. मेसचे २७० रुपये भरून उरलेल्या २३० रुपयांत महिना आरामात निघायचा. मिनी ड्राफ्टर, सायंटिफिक कॅल्क्युलेटर वगैरे खरेदी असली, की जास्त पैसे लागायचे, पण ती सगळी खरेदी आधीच झाली होती. तोवर कॉलेजमध्ये होस्टेलची मुलं आणि 'सिटी'तली मुलं असे गट पडलेच होते. स्लीव्हलेस ब्लाउज घालून वर्गावर येणाऱ्या हाय-फाय मॅडम बघून शिकण्यातलं उरलंसुरलं लक्षही पार कापरासारखं उडून गेलं होतं. त्याच मॅडम अचानक समोर आल्या, तर मात्र अंगाला कापरं भरत होतं. फिजिक्सचे सर मात्र आवडायचे. ते म्हणायचे, नुसती अभ्यासाची पुस्तकं वाचू नका; बाहेर फिरा, जग बघा, सिनेमे बघा... मी त्या सरांचा सल्ला तंतोतंत अमलात आणला.
राहुल - ७० एमएम! तेव्हाचं पुण्यातलं सगळ्यांत भारी थिएटर होतं राहुल! आमच्या पॉलिटेक्निकपासून सायकलनी दहा मिनिटांच्या अंतरावर! गणेशखिंड रस्त्यावर सगळा उतारच होता. एक पायडल मारलं, की थेट 'राहुल'पाशी सायकल थांबायची. तिथं सगळे इंग्रजी सिनेमे लागायचे. पण आम्ही १६-१७ वर्षांची मुलं लहान दिसायचो. कधी आत सोडायचे, तर कधी नाही! एकदा 'टू मून जंक्शन'ला बसायला मिळालं. पहिल्याच दृश्यात बाथरूममधली विवस्त्र नायिका दिसली आणि कानशिलं तापली. माझ्या आयुष्यात मी प्रथमच पडद्यावर नग्न स्त्री पाहिली होती. त्यामुळं माझ्या आयुष्यात या थिएटरचं स्थान किती महत्त्वाचं होतं, हे सांगायला नकोच. अर्थात आम्ही फक्त 'राहुल'ला इंग्रजी सिनेमे बघत होतो, असं नाही. अगदी ट्रिपल सीट सायकलवरून 'प्रभात'ला जाऊन सोळाव्या आठवड्यातही जोरात सुरू असलेला 'माहेरची साडी' पण बघितलाच होता. एक रूम-पार्टनर घरी येताना भलताच भावूक झाला होता. पण हे असे क्षण तसे कमीच. बाकी होस्टेली आयुष्य म्हणजे भर दुपारचं वाळवंटातून चालणं होतं. त्याच वर्षी नानाचा 'प्रहार' प्रदर्शित झाला. या सिनेमात नाना लष्करातून सिव्हील लोकांमध्ये येतो, तेव्हा प्रत्येक वेळी त्याच्या अंगाचा तिळपापड होऊन तो लोकांना मारत सुटतो. तेव्हा आजूबाजूला सगळं असंच चित्र होतं. समाजातलं दूषित, घाणेरडं वातावरण बघून आमच्याही डोक्यात तिडीक जात होती. पण या संतापाला वाट करून देण्यासाठी मार्गच नव्हता. असंच १९९१ संपलं आणि १९९२ उजाडलं. माझं अभ्यासात लक्ष नव्हतंच. ऑस्ट्रेलियात क्रिकेट वर्ल्ड कप सुरू झाला होता. आम्ही पोरं पहाटे चार वाजता सुरू होणाऱ्या मॅचेस 'लाइव्ह' पाहायला युनिव्हर्सिटीच्या होस्टेलवर जायचो. तेव्हा नव्यानंच 'स्टार'चं प्रक्षेपण सुरू झालं होतं. ते प्रक्षेपण पाहताना खास वाटत होतं. सचिन तेंडुलकर नावाचा नवा हिरा सहाव्या नंबरवर येऊन चांगली बॅटिंग करत होता. पाकिस्तानला आपण त्या वर्ल्ड कपमध्ये हरवलं. मियाँदादच्या माकडउड्या गाजल्या. बाकी वर्ल्ड कप आपल्याला तथातथाच गेला. माझी अभ्यासात तीच अवस्था होती. वर्गात शिकवलं, त्यापलीकडं काही अभ्यास करण्यात मला रस वाटत नव्हता. होस्टेलवर खाली पडलेले पेपर वाचण्यात मी टाइमपास करत होतो. वह्यांची मागची पानं भरत होती. आमच्या गॅदरिंगमध्ये थर्ड इयरच्या संदीप खरे नावाच्या मुलानं स्वतः पेटी वाजून, स्वतःचीच कविता असलेलं 'मन तळ्यात मळ्यात' हे गाणं गायलं तेव्हा फार मस्त वाटलं होतं. आम्ही फक्त टाळ्या वाजवत होतो. तेव्हा 'नक्षत्रांचे देणे' कॅसेट बाजारात आली होती. आशाताईंची 'तरुण आहे रात्र अजुनी' वगैरे गाणी ऐकून, त्यावर फुलस्केप लेख लिहिण्याइतपत प्रगती झाली होती. परिणामी, पहिल्या वर्षाचा 'निकाल' लागला. अस्मादिक नापास झाले होते. सपशेल लोटांगण! हा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर झालेला भलताच 'प्रहार' होता. 'राजसा, (परीक्षेत असा) निजलास का रे,' असं स्वतःलाच विचारायची वेळ आली होती.
नापास झालो, तरी गावी घरी गेलो नाही. लाज वाटली. मग पुण्यातच राहिलो. आमच्या आत्याचा एक छोटा फ्लॅट होता आळंदी रोडवर. तिथं मुक्काम हलवला. तिथून सायकल चालवत सदाशिव पेठेत सायकलवर भिडे क्लासला यायचं. परत जाताना कसब्यात आत्याकडं जेवायचं आणि संध्याकाळचा डबा घेऊन आळंदी रोडवर जायचं. रात्री त्या रिकाम्या फ्लॅटमध्ये, भकासपणे ती गार पोळी-भाजी खायची. काही दिवसांनी आत्याचा जुना टीव्ही तिथं आला आणि किमान रात्रीचा भयाणपणा गेला. शुक्रवारी रात्री दूरदर्शनवर 'प्रौढांसाठीचे' सिनेमे लागायचे. मी शुक्रवारची रात्र उगवायची आतुरतेने वाट पाहायचो. याच ठिकाणी मी माझी पहिली डायरी लिहिली. (ही डायरी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...) स्वतःशीच लढणाऱ्या मुलाचं ते करुण मनोगत होतं. ती डायरी कित्येक दिवस माझ्याकडं होती. तिथून घरी पत्र पाठवताना मी वर 'येरवडा कारागृह (?)' असं लिहीत असे. थोडक्यात, पुलंची पुस्तकं वाचून तरारलेली विनोदबुद्धी शाबूत होती. तिनंच तर तारलं नंतर कायम! पण हे वाचून घरच्यांना काय वाटत असेल, याचा कधीही विचार मनात आला नाही. पण एकूणच १९९२ हे वर्ष प्रचंड खळबळीचं ठरलं. वैयक्तिक आयुष्यातही आणि देशाच्याही! याच वर्षी सहा डिसेंबरला अयोध्येत बाबरी मशीद पडली. देश कायमस्वरूपी बदलला या घटनेनंतर! तेव्हा हे कळत नव्हतं. फक्त आजूबाजूला सुरू असलेलं हिंसक थैमान तेवढं दिसत होतं. तोवर सलमान, आमीर आणि शाहरुख या तिन्ही खानांची चित्रपटसृष्टीत चलती सुरू झाली होती. लता-आशा अजून गात होत्या; पण अनुराधा पौडवाल, कुमार सानू, अलका याज्ञिक, उदित नारायण हे गायक आणि नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद, जतीन-ललित हे संगीतकार हळूहळू आपलं स्थान निर्माण करत होते. 'आशिकी' हा नव्वदमध्ये आलेला चित्रपट मला दहावीमुळं पाहता आला नव्हता; पण त्याच्या गाण्यांनी सगळ्यांना वेड लावलं होतं. कित्येक दिवस 'चित्रहार'मध्ये 'आशिकी'चं गाणं पहिल्यांदा लागायचं. या सगळ्यांत बापमाणूस म्हणावासा एक संगीतकार १९९२ मध्येच अवतरला. चित्रपट होता - रोजा आणि या अवलिया संगीतकाराचं नाव होतं ए. आर. रेहमान! रेहमानच्या संगीताचा अमीट ठसा या संपूर्ण दशकावर उमटला आहे. पुढचं प्रत्येक वर्ष त्याचा एकेक क्लासिक चित्रपट येत गेला आणि आमची पिढी रेहमानच्या मागे वेडी झाली. 'रोजा'नंतर बॉम्बे, रंगीला, दिल से, ताल, झुबेदा अशा प्रत्येक सिनेमागणीक रेहमान एकेक मास्टरपीस गाणी निर्माण करत होता आणि लता-आशासह भारतातले झाडून सर्व दिग्गज त्याच्याकडे गात होते. 
अशा धाकधुकीतच १९९३ उजाडलं. पु. ल. देशपांडे यांची कथा-पटकथा असलेला शेवटचा चित्रपट 'एक होता विदूषक' एक जानेवारी १९९३ रोजी झळकला. मात्र, दंगलीच्या धामधुमीत तेव्हा तो पाहताच आला नाही. या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीत मुंबईत पुन्हा दंगली झाल्या. मार्चमध्ये या दंगलींचा सूड म्हणून दाऊदनं मुंबईत १२ तारखेच्या शुक्रवारी भीषण बॉम्बस्फोट घडविले आणि मुंबई पहिल्यांदा दहशतवादाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिकार झाली. देशात हळूहळू काही तरी बिघडत चाललंय, याची एक अस्पष्ट जाणीव कुठं तरी मनात रुजत गेली ती याच काळात. याच वर्षी मे महिन्यात पेपर दिले आणि पास झालो. पुन्हा पुण्यात कॉलेज सुरू झालं. त्या वर्षीचा गणेशोत्सव विशेष होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ती शताब्दी होती. तेव्हा बाबूराव सणस मैदानात भव्य मंडप उभारून, महिनाभर सलग रोज कार्यक्रम ठेवण्यात आले होते. मी रोज तिथं जायचो. बाबामहाराज सातारकरांचं कीर्तन असायचं. रात्री गाण्याचे कार्यक्रम असायचे. त्यातच पं. हृदयनाथ मंगेशकरांचा 'अमृताचा घनु' कार्यक्रम ऐकला. आशा भोसले आणि लतादीदींना 'लाइव्ह' ऐकलं प्रथमच! पण हा आनंद काही काळच टिकला. त्याच वर्षी गणपतीत अनंत चतुर्दशीच्या दिवशी, ३० सप्टेंबरला लातूरमध्ये किल्लारीला महाभयंकर भूकंप झाला आणि हजारो लोक ठार झाले. त्या दिवशी पहाटे मी आत्याच्या घरी झोपलो होतो. हा भूकंप मी स्पष्टपणे अनुभवला. तोवर मला भूकंपाचा अनुभव नव्हता. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेलो. दुपारी 'संध्यानंद' आला आणि त्यात बातमी वाचली, तेव्हा कळलं. भूकंपाच्या भयावह कहाण्या आणि पुनर्वसनाचे प्रयत्न याबाबतच्या बातम्या पुढचे कित्येक दिवस पेपरांमधून येत होत्या. माझं कॉलेजमधलं दुसरं वर्ष पहिल्या वर्षाहून भीषण निघालं. फक्त या वेळी काही नवे मित्र मिळाले. ते मैत्र बरेच काळ टिकलं. मला सगळं इंजीनिअरिंग अवघड जात होतं, हे तर उघडच होतं. मला घासून अभ्यास कसा करतात, हे माहिती नव्हतं. मी टीपी करत बसायचो. बाकी मुलं गुपचूप अभ्यास करायची. शेवटी गावाकडच्या एका मित्रानं बाहेर नेलं. चतुःश्रुंगीच्या पायथ्याशी एका बाकड्यावर बसवून भलं-मोठं लेक्चर दिलं. पण काहीही परिणाम झाला नाही. 
बघता बघता १९९४ उजाडलं. उजाडलं तीच एक दुःखद बातमी घेऊन! माझी आजी (वडिलांची आई) गेली. आजोबा पाच वर्षांपूर्वीच गेले होते. आता आजीही गेली. गावाकडचे सगळ्यांत घट्ट बंध एका फटक्यात तुटल्यासारखे झाले. मन सैरभैर होऊन गेलं. दोनच दिवसांनी, चार जानेवारीला 'पंचमदा' अर्थात, आर. डी. बर्मन गेले. अर्थात त्यांच्या मृत्यूमुळं झालेला तोटा कळण्याचं ते वय नव्हतं. पुढं त्याच वर्षी आलेल्या त्यांच्या शेवटच्या '१९४२ - ए लव्ह स्टोरी'तील गाण्यांनी आणि विशेषतः मनीषानं आम्हाला वेड लावलं होतं. 'कुछ ना कहो' गाण्यातला मनीषा-अनिल कपूरचा हळुवार, पण तरीही तप्त रोमान्स बघून डोकं झिणझिणलं होतं. मग हळूच हिंदीत ज्याला 'दबे पाँव' म्हणतात, तशी परीक्षा आली आणि पुन्हा माझा त्रिफळा उडवून गेली. सलग दुसऱ्या वर्षीही नापास! आता काही खरं नव्हतं. गुपचूप घरची वाट धरण्याशिवाय पर्याय नव्हता. पुढचे तीन-चार महिने कसे गेले, मला काहीही आठवत नाही. एकच आठवतं, परीक्षेचा निकाल लागल्यानंतर माझ्या रूम पार्टनरनं त्याच्या गावाकडं गळफास लावून आत्महत्या केली होती. वर्षभर एकाच खोलीत राहणारे आम्ही, पण त्याच्या अंतिम दर्शनाला जाऊ शकलो नाही. आतून पूर्ण कोलमडून गेलो होतो. कसा अभ्यास केला, कशी परीक्षा दिली काहीही आठवत नाही. पण या वर्षातला नोव्हेंबर माझ्या आयुष्यातला 'टर्निंग पॉइंट' घेऊनच उगवणार होता. तेव्हा नगरला एक मे १९९४ रोजी धुमधडाक्यात 'लोकसत्ता' सुरू झाला होता. मुंबईचा मोठा ब्रँड असलेल्या या वृत्तपत्रानं नगरमध्ये 'नगरच्या मातीचा, महानगरांच्या धर्तीचा' म्हणत आपली जंगी आवृत्ती सुरू केल्याचं नगरकरांना फार अप्रूप वाटत होतं. सगळे जण फक्त 'लोकसत्ता' वाचत होते तेव्हा नगरमध्ये! माझ्या इंजिनीअरिंगच्या शिक्षणाचं भवितव्य मला स्पष्ट दिसत होतं. अशातच एक दिवस 'लोकसत्ता'त 'मुद्रितशोधक पाहिजेत' अशी जाहिरात वाचली आणि 'मुद्रितशोधक' म्हणजे काय, त्याचं काम काय असतं, वगैरे काहीही माहिती नसताना अर्ज ठोकून दिला. नाही तरी पुढच्या वर्षी कॉलेज सुरू होईपर्यंत घरी बसून काय करायचं, हा प्रश्न होताच. काही दिवसांनी मला काहीच उत्तर आलेलं नाही, बघून मी स्वतःच 'लोकसत्ता'च्या कार्यालयात गेलो. मी गेल्यावर त्यांनी माझा अर्ज पुन्हा बाहेर काढला. तिथल्या तिथं मला एक बातमी तपासायला दिली. मला प्रूफरीडिंग कसं करतात हे माहिती नव्हतं. पण चुकीचे शब्द कोणते, वाक्यरचना कशी हवी हे कळत होतं. माझा पेपर तपासल्यानंतर त्यांनी तिथल्या तिथं माझा इंटरव्ह्यू घेतला आणि 'उद्यापासून ये' असं सांगितलं. माझा आनंद गगनात मावेना. चार वर्षं सगळीकडून रिजेक्शनच झेलल्यानंतर कुणी तरी मला स्वीकारलं होतं. मला काही तरी येतंय, मी आयुष्यात काही तरी करू शकतो, हा फार मोठा दिलासा आणि विश्वास त्या दहा मिनिटांच्या इंटरव्ह्यूनं मला दिला. मी 'लोकसत्ता'त रीतसर प्रूफरीडर म्हणून नोकरीला लागलो. मला एक हजार रुपये पगार मिळायला लागला. मी सायकलवरून सात किलोमीटर अंतरावरील ऑफिसला जायचो आणि रात्री बाराच्या सुमारास परत यायचो. माझ्या आयुष्यातला हा महत्त्वाचा टप्पा होता. आपण काय करू शकतो, याचा अंदाज मला इथं आला. 'लोकसत्ता'तले सतीश कुलकर्णी माझे फ्रेंड-फिलॉसॉफर-गाइड होते. त्यांनी माझ्या भरकटलेल्या आयुष्याला दिशा दिली. 'लोकसत्ता'तले ते सात-आठ महिने माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचे ठरले. 
मी तेव्हा नुकतीच १९ वर्षं पूर्ण केली होती. याच वर्षी सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या राय अनुक्रमे 'मिस युनिव्हर्स' आणि 'मिस वर्ल्ड' झाल्या होत्या. (यातली सुश्मिता मला इतकी आवडली, की तिच्याशीच लग्न करण्याचा निश्चय मी करून टाकला. तो बरेच दिवस टिकला होता.)
अशातच १९९५ हे वर्ष उजाडलं आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. शरद पवार तेव्हा मुख्यमंत्री होते. सोनईला त्यांची पहिली सभा झाली. त्याची एक जनरल बातमी तिथल्या बातमीदारानं पाठविली होती. मात्र, त्यातलं एक वाक्य - 'जोशी, महाजनांच्या हाती सत्ता देणार का?' आमच्या वरिष्ठांनी अचूक हेरलं. त्याचीच हेडलाइन झाली आणि ती 'लोकसत्ता'च्या सर्व आवृत्त्यांत छापून आली. मी हे सर्व बघत होतो. पुढं महाराष्ट्राची निवडणूक फिरली आणि 'जोशी-महाजनां'चीच सत्ता आली. त्यात या बातमीचा फार मोठा वाटा होता, असं मला अजूनही वाटतं. दरम्यान माझा सेकंड इयरचा निकाल लागला आणि मी पास झालो. 'लोकसत्ता'त आधीच सांगितल्याप्रमाणे मी काम सोडलं आणि थर्ड इयरसाठी पुन्हा पुण्यात येऊन दाखल झालो. त्या गणपतीत 'गणपती दूध पीत असल्या'ची जोरदार अफवा सगळीकडं पसरली. आजच्यासारखा सोशल मीडिया नसतानाही अत्यंत वेगानं ही अफवा सगळीकडं पसरली होती. तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी, त्यांच्या घरचा गणपतीही दूध पीत असल्याचं सांगून, टीकाकारांच्या हाती आयतं कोलीत दिलं. दिवाळीच्या आधी आमच्या टेस्ट होत्या. मशिन डिझाइनचा पेपर होता. माझा अभ्यास अजिबात झाला नव्हता. बाहेर कुंद पावसाळी वातावरण होतं. सगळीकडं एक ओलसर उदासपणा दाटला होता. मला रूममध्ये बसून प्रचंड ढवळून यायला लागलं. आपण हे काय करतोय, असं सारखं वाटायला लागलं. हे संपूर्ण वर्ष आपल्याकडून इथं निघणं अशक्य आहे, याची जाणीव झाली आणि मी एक निर्णय घेतला. माझा बाडबिस्तरा गुंडाळून, रूममधलं सगळं सामान घेऊन मी रिक्षा केली आणि तडक शिवाजीनगरला येऊन नगरची बस पकडली. मी इंजिनीअरिंग सोडलं ते कायमचं! त्या दिवसापासून आजतागायत मी 'जीपीपी'मध्ये पुन्हा पाय ठेवलेला नाही. सेकंड इयरला असताना 'मेकॅनिकल'ला मी मिळवून दिलेलं क्विझ काँपिटिशनचं विजेतेपद आणि 'दमां'च्या हस्ते गॅदरिंगमध्ये मिळालेलं त्याचं बक्षीस एवढा एकच चांगला क्षण माझ्या आठवणीत या कॉलेजबाबत राहिला.
नगरला परत आलो आणि पुन्हा 'लोकसत्ता'त जाऊन उभा राहिलो. तुमच्या भरवशावर सगळं सोडून आलोय, असं सांगितलं आणि पुन्हा नोकरीवर घ्या, म्हणालो. त्यांनी पण लगेच मला कामावर घेतलं. पगारही पाचशे रुपयांनी वाढला. आजूबाजूचं वातावरण हळूहळू बदलताना दिसत होतं. हर्षद मेहताचा गैरव्यवहार घडून गेला होता. सूटकेसमध्ये कोटी रुपये कसे बसू शकतात, यावर जसपाल भट्टी टीव्हीवर त्यांच्या 'शो'मध्ये धमाल कॉमेडी करत होते. (हा माणूस माझ्या आयुष्यात पुढं फार महत्त्वाची भूमिका बजावणार होता, हे तेव्हा ठाऊक नव्हतं.) १९९५ च्या १५ ऑगस्टला तेव्हाचे दूरसंचारमंत्री सुखराम यांनी बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांना दिल्ली ते कोलकता असा मोबाइल कॉल केला आणि भारतात मोबाइलचं युग अवतरलं. तेव्हा बिर्ला एटी अँड टीच्या कृष्णधवल पूर्ण पान जाहिराती पेपरांमध्ये झळकलेल्या आठवतात. पोलिसांच्या वायरलेस सेटसारखे दिसणारे मोठ्या आकाराचे मोबाइल काही जणांकडे दिसू लागले. आउटगोइंगला २४ रुपये मिनिट आणि इनकमिंगला १६ रुपये मिनिट हा दरही चांगलाच लक्षात आहे. यातूनच 'जुगाडू' भारतीयांनी 'मिस कॉल' नावाच्या अद्भुत प्रकाराचा शोध लावला. मला विशीबरोबर मिशी फुटली होती, पण ती राखावी असं कधीच वाटलं नाही. होस्टेलवर मित्रानं दाढी करायला शिकवलं होतं. वडील 'गोदरेज'चा गोल डबीतला साबण आणि 'टोपाझ'चं ब्लेड घेऊन दाढी करताना पाहिले होते. मी मात्र पहिल्यापासून 'यूज अँड थ्रो' रेझरनं दाढी करायला लागलो. भारीतलं शेव्हिंग क्रीम आणि आफ्टरशेव्ह लोशन माझ्याकडं होतं. वडिलांप्रमाणे तुरटी वगैरे कधी मी फिरवली नाही. हे बदल तेव्हा जाणवत नव्हते, पण आजूबाजूचा भवताल असा सूक्ष्मपणे बदलत होता. रामगोपाल वर्माच्या 'रंगीला'त रेहमानच्या तालावर थिरकणाऱ्या अल्पवस्त्रांकित ऊर्मिलाला बघून आम्हाला 'आँ!' असं झालं होतं. याच वर्षी दिवाळीत 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' झळकला आणि हे बदल अधिक लखलखीतपणे दृग्गोचर होत गेले. भारतातल्या तमाम मुलींना यातला 'जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी' हा संदेश मनापासून भिडला, पटला!
अशातच १९९६ उजाडलं. मी 'लोकसत्ता'त काम करतच होतो. मला आता 'कॉलेज पोर्च' नावाचं सदर लिहायची संधीही मिळाली होती. मी वेगवेगळ्या कॉलेजांत जाऊन तिथल्या कार्यक्रमांचं वार्तांकन करीत असे. जेव्हा असं काही नसे, तेव्हा मी वेगवेगळ्या विषयांवर ललित लेखन करत असे. या लेखनानं मला आपण लिहू शकतो आणि ते पेपरमध्ये प्रसिद्ध होऊन हजारो वाचकांपर्यंत पोचू शकतं, त्यांना ते आवडू शकतं, हा आत्मविश्वास दिला. तेव्हा आम्ही नगरमधले सगळे पत्रकार सकाळी वाडिया पार्कला क्रिकेट खेळायला जायचो. जानेवारीत नगरला क्रॉम्प्टन करंडक ही मोठी क्रिकेट स्पर्धा भरायची. महाराष्ट्रातले मोठमोठे क्लब यात भाग घ्यायचे. एकदा रोहन गावसकरला जवळून बघण्याची संधी तेव्हा मिळाली होती. एकदा झहीर खान नावाचा श्रीरामपूरचा एक डावखुरा मुलगा फार भारी फास्ट बोलिंग करतो, असं ऐकलं. वाडिया पार्कच्या वरच्या डेकवर बसून मी त्या मुलाची गोलंदाजी पाहिलीसुद्धा होती. याच वर्षी बहिणीचा एमपीएससीचा अर्ज नेऊन देण्याच्या निमित्तानं मला आयुष्यात प्रथमच मुंबईला जाण्याची संधी मिळाली. मी वयाच्या एकविसाव्या वर्षी प्रथम या महानगरीत पाऊल ठेवलं. पॉलिटेक्निकच्या होस्टेलवर असताना एका मित्रानं मला मुंबईचा भलामोठा नकाशा दिला होता. तो नकाशा मी अगदी पाठ करून ठेवला होता. त्यामुळं एकटाच पहिल्यांदा मुंबईत गेलो तरी कुणाला न विचारता, मी बेस्ट, लोकल अशी सगळी सार्वजनिक वाहतुकीची साधनं वापरून मुंबई दिवसभर पालथी घातली. संध्याकाळी दादरला शिवाजी मंदिरला जाऊन साक्षात प्रभाकर पणशीकरांचं 'तो मी नव्हेच' नाटकही पाहिलं. तेव्हा त्याचं तिकीट होतं २० रुपये. (पुढं पाचच वर्षांनी मला पंतांचा एक पूर्ण दिवस सहवास लाभणार आहे आणि त्यांची मुलाखतही घेता येणार आहे, हे तेव्हा गावीही नव्हतं.) मुंबईला माझं जाणं म्हणजे एक प्रकारे विहीर, मोठा तलाव, सरोवर झाल्यानंतर थेट महासागराचं दर्शन घेण्यासारखं होतं. मुंबईच्या दर्शनानं मी स्तिमित होऊन गेलो. मला त्या भव्य शहरानं प्रथमदर्शनीच प्रेमात पाडलं आणि ते प्रेम अजूनही कायम आहे. मुंबईत जाऊन राहावं, तिथं काम करावं अशी तेव्हा प्रचंड इच्छा झाली होती. मात्र, तो योग अजूनपर्यंत तरी काही आलेला नाही. असो.
१९९७. नगरमध्ये सत्तरावं साहित्य संमेलन भरलं होतं. या संमेलनाच्या तुतारीनंच १९९७ हे वर्ष उजाडलं. नगरच्या संमेलनामुळं मी आयुष्यात प्रथमच साहित्य संमेलन बघितलं. या प्रकाराशी पुढं आपली कायमची नाळ जोडली जाणार आहे, हे तेव्हा अर्थातच माहिती नव्हतं. नगरचं संमेलन प्रचंड गर्दीमुळं गाजलं. ग्रंथदिंडीत भेटलेले विंदा बघून भारावून जायला झालं. गिरीश कार्नाडांचं दमदार उद्घाटनाचं भाषण जोरात गाजलं. 'लोकसत्ता'त आम्ही या संमेलनाचं जोरदार वार्तांकन करीत होतो. पुण्याहूनही ज्येष्ठ-श्रेष्ठ लोक आले होते. त्यांच्या कॉप्या (बातमी) वाचायची, त्यांचं प्रूफरीडिंग करण्याची संधी मला मिळाली. एखाद-दुसऱ्या कार्यक्रमाचं वार्तांकनही मी केल्याचं आठवतंय. शेवटच्या दिवशी साक्षात गुलजारांच्या उपस्थितीत हृदयनाथ मंगेशकरांनी पहाटेपर्यंत रंगविलेली 'भावसरगम'ची मैफल अजूनही लक्षात आहे. या वर्षात आजूबाजूची परिस्थिती झपाट्यानं बदलताना दिसत होती. नरसिंह रावांचं सरकार गेलं होतं आणि वाजपेयींच्या १३ दिवसांच्या सरकारच्या नाट्यानंतर आलेले देवेगौडा तेव्हा पंतप्रधान होते. केंद्रात अस्थिर वातावरण होतं, पण राज्यात बाळासाहेबांचा 'रिमोट कंट्रोल' जोरात होता. पुलंना महाराष्ट्रभूषण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि १९९६ च्या शेवटी त्यांनी हा पुरस्कार स्वीकारताना केलेली ठोकशाहीवरची टीका यांचं सावट नगरच्या संमेलनावर होतं. कार्नाडांच्या भाषणात त्यांनी यावर 'सैनिकां'ची गोष्ट सांगून फार सूचक भाष्य केलं होतं. आमच्या घरी तेव्हा छोटा पोर्टेबल ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही होता आणि फक्त अँटेनावरून दिसणारं 'दूरदर्शन' हे एकच चॅनेल होतं. तेव्हा नगरच्या लघुप्रक्षेपकाद्वारे नऊ क्रमांकाच्या चॅनेलवरून दूरदर्शन दिसे. पुण्याच्या सिंहगडवरून होणारं प्रक्षेपण पाच क्रमांकाच्या चॅनेलवरून दिसे. दिल्लीचं प्रक्षेपण झालं, की मुंबई दूरदर्शनचं प्रक्षेपण सुरू होत असे व त्याच्या सूचना या थेट पडद्यावरूनच जाहीर दिल्या जात असत. अनेकदा नगरच्या केंद्रातले लोक मुंबई दूरदर्शनवर 'स्विच' करत नसत. त्यामुळं संध्याकाळचे पाच वाजून गेले, तरी आम्हाला दिल्लीचेच कार्यक्रम दिसत. मग अशा वेळी मी वर जाऊन अँटेना पुण्याच्या (सिंहगडच्या) दिशेनं फिरवी व खाली येऊन पाच क्रमांकाचं चॅनेल लावी. ‘सिंहगड’चे लोक कधी चुकत नसत. त्यामुळं थोडं खरखरीत का होईना, पण मुंबई दूरदर्शन व विशेषतः मराठी सिनेमा बघायला मिळे. आम्ही केबल घेतली नसल्यानं त्या काळातल्या 'झी' वगैरेवरील मालिका मला माहिती नसायच्या. पण काही मित्रांच्या बोलण्यात या मालिकांचे उल्लेख यायचे तेव्हा आपण मागासलेले आहोत, असं वाटायचं. मात्र, या वर्षी भारतात झालेला विल्स वर्ल्ड कप पुरेपूर एंजॉय केला. विशेषतः बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आपण पाकिस्तानचा पुन्हा खात्मा केला, तेव्हा देशभर उसळलेला जल्लोष अभूतपूर्व होता. मात्र, उपांत्य फेरीच्या सामन्यात कोलकत्यात आपण माती खाल्ली आणि कांबळी रडला. लोकांनी स्टेडियम पेटवून द्यायचंच बाकी ठेवलं होतं. त्या कटू आठवणी खूप दिवस छळत राहिल्या.
पण १९९७ या वर्षानं माझं तिसरं आणि (कदाचित शेवटचं मोठं) स्थित्यंतर घडवून आणलं...

(क्रमश:) 

दृष्टी-श्रुती दिवाळी १९ - लेख - भाग १

नव्वदचं दशक - 'अस्वस्थ' ते 'आश्वस्त'...
------------------------------------------------

भाग १
--------

नव्वदचं दशक उजाडलं, म्हणजेच १९९० हे वर्ष उजाडलं तेव्हा मी १४ वर्षांचा होतो. नववीत होतो. नगरसारख्या महाराष्ट्रातल्या एका मध्यम मध्यम शहरात राहत होतो. माझ्या आयुष्यातलं सर्वांत मोठं स्थलांतर घडून दोन वर्षं झाली होती. मी माझं जन्मगाव सोडलं होतं आणि कुटुंबासह जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन राहिलो होतो. एका अर्थानं मी छोट्या विहिरीतून तलावात आलो होतो. पुढच्याच वर्षी मी आणखी मोठ्या सरोवरात विहरायला जाणार होतो. माझं वय १४ होतं, म्हणजे मी सर्वार्थानं अंड्यातून बाहेर आलेलं पिल्लू होतो. 'अंगणात गमले मजला संपले बालपण माझे' असं ग्रेस म्हणतात, तसं नगर हे माझं अंगण होतं. जन्मगावातल्या गर्भाशयासारख्या सुरक्षित उबेतून मी एकदम बाहेर आलो होतो. मला बाहेरचं जग सोसेल की नाही, ऊन-वारा सहन होईल की नाही याचा कुठलाही विचार न करता मला एका नैसर्गिक प्रक्रियेचा भाग असल्यासारखं बाहेर भिरकावून देण्यात आलं होतं. माझं गाव, माझं घर, माझी खोली, तिथली माझी झोपायची जागा, तिथलं अंथरूण-पांघरूण, आजीच्या कुशीतली ऊब हे सगळं सगळं ८० किलोमीटरवर सोडून मी एका अनोळखी, शहरी वासाच्या गावात आलो होतो. नगरला शहर म्हणणं कठीण होतं; पण आमचं गाव तेव्हा इतकं छोटं होतं, की मला नगर हे खूप मोठ्ठं शहर वाटत होतं. तिथं शहराचा वास येत होता. आमच्या गावी घराजवळ येणाऱ्या उकिरड्याचा, तिथं लोळणाऱ्या डुकरांचा वास इथं नव्हता. इथं सकाळी सहा वाजता पेपर येत होता. गवळी येऊन दूध घालून जात होता. इथं कॉन्व्हेंट शाळा होत्या आणि मुलं टाय लावून शाळेत जात होती. इथं रिक्षा होत्या, सिटीबस होत्या आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे इथं बेकऱ्या होत्या. इथं पाव मिळत होता. माझ्या गावी तोवर ताजा पाव मिळत नसे. त्यामुळं माझ्या लहानपणच्या आठवणीत शहरी मुलांसारख्या पाव-बिस्किटं या गोष्टीच नव्हत्या. त्या इथं आल्या. पहाटे क्लासला जाताना कुठल्या ना कुठल्या बेकरीतून ताजे खमंग पाव भाजल्याचा वास यायचा आणि आपण शहरात राहतो, या जाणिवेनं माझं मन हरखून जायचं. इथं एकच का होईना, पण बाग होती. आमच्या गावात बाग सोडाच, पण ओळीनं लावलेली तीन फुलझाडं मी कधी पाहिली नाहीत. जी काही होती, ती आमच्या अंगणातच होती. आमच्या आजोबांनी मोठ्या हौसेनं रातराणी, काटेकोरांटी आणि दोन कण्हेरीची झाडं लावली होती. मात्र, त्या झाडांचा डुकरांपासून बचाव करणं हे आमच्यापुढचं सगळ्यांत मोठं आव्हान असायचं. 
नगरमधली सर्वांत भारी शाळा माझ्या नशिबात नव्हती. मला मिळाली ती गरिबांची शाळा. शाळा गरीब मुलांची असली, तरी शिक्षक मनानं व ज्ञानानं अतिशय श्रीमंत होते. एका मंदिराच्या आजूबाजूला, जागा मिळेल तसे आमचे चिमुकले वर्ग बांधलेले होते. याउलट आमची गावची शाळा जास्त नीटनेटकी व भक्कम बांधलेली होती. पण मला या गरिबांच्या शाळेनं जे दिलं, ते एखाद्या भारी बिल्डिंगमधल्या शाळेनंही कधी दिलं नसतं. या शाळेनं मला माणसाकडं माणूस म्हणून पाहायला शिकवलं. सगळ्यांबरोबर समानतेनं वागायला, सहानुभूतीनं-प्रेमानं वागायला शिकवलं. आमच्या वर्गात अनेक मुलं डबा आणत नसत. मी टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा होतो. पोळी, बटाटा किंवा कोबीची भाजी आणि लोणचं असा डबा मी नेत असे. आमच्या मंदिरात बसून मी एका मित्रासोबत तो खात असे. अनेक मुलं तेव्हा डबा न खाता नुसतीच खेळत असत. ती डबा का आणत नसतील, हा विचार तेव्हा कधीच मनाला शिवला नाही. आता विचार करून काळीज तुटतं. पण तेव्हा ती हसतमुख मुलं पाहून मला काहीही उमगलं नाही, हे खरं!
फार लहानपणीच, म्हणजे आठवीत असतानाच घरच्या जबाबदाऱ्या घ्यायची सवय त्या काळानं मला लावली. वडील नोकरीला जायचे आणि उशिरा घरी यायचे. कधी फिरतीवर जायचे. तेव्हा घरचा किराणा भरण्यापासून ते सिलिंडर आणण्यापर्यंतची सगळी कामं आठवीतला तो पोरगा करीत असे. सायकलच्या दोन्ही बाजूला दोन मोठ्या पिशव्या लावून, डुगडुगत हळूवारपणे दोन-तीन किलोमीटर अंतरावरच्या घरी तो सायकल पायी चालवत नेत असे. सिलिंडर आणणे हा एक दिव्य प्रकार असे. त्या लांबलचक रांगेत उभं राहून पावती घ्यायची, मग दुसरीकडं गोडाउन असलेल्या ठिकाणी जुनं सिलिंडर न्यायचं व नवं आणायचं हा एक सोहळा असे. सायकलच्या मधे तिरकं ठेवून ते सिलिंडर आणणं ही एक सर्कस होती. पण आठवीतल्या पोराला त्याचं काही वाटत नसे. त्याच्यासमोर दुसरा पर्यायही नव्हताच म्हणा. कधी ते सिलिंडर दाणकन पडे. तेव्हा त्या गावात काही भली माणसं राहत. त्यातलं कुणी तरी पुढं होऊन ते सिलिंडर पुन्हा पक्कं बसवून देई. शाळेची सहल निघाली, तेव्हा फुलपँट घ्यायचा आग्रह केला एकदा या मुलानं. गावातल्या बड्या दुकानात जाऊन नव्वद रुपयांची फुलपँट आणली मग त्यानं; कारण आईकडं फक्त शंभर रुपयेच होते. 
याचा अर्थ तेव्हाचं जगणं अगदी वाईट, रडूबाई होतं का? तर मुळीच नाही. आज मागं वळून बघताना या गोष्टी जाणवतात, पण तेव्हा त्या मुळीच जाणवत नव्हत्या किंवा त्याचा त्रासही होत नव्हता. पंधराव्या वर्षी वयात येऊ घातलेल्या मुलाचं सगळं जगणं मोरपंखीच असतं. प्रत्येक क्षण स्वप्नाळू असायचा. वास्तवाच्या कडक उन्हावर स्वप्नांच्या ढगांची सावली धरली जायची. आणि हा मुलगा तसा हुशार होता. गावाकडची हुशारी म्हणजे 'वासरात लंगडी गाय शहाणी' असं नव्हतं, हे त्यानं मोठ्या शहरात येऊन सिद्ध केलं. स्काउटमध्ये भाग घेतला, की त्यालाच प्लाटून कमांडर केलं जायचं. त्या वर्षी त्यानं कलेक्टरसमोर ऐटीत संचलन केलं होतं. चित्रकला परीक्षेला बसला आणि तेव्हा दुर्मीळ अशी 'ए' ग्रेड मिळवून दाखविली. विज्ञान प्रदर्शनात भाग घेतला आणि त्याला त्याच्या आयुष्यातली पहिली परी गवसली. ती दुसऱ्या शाळेतून याच्या शाळेत आली होती. ती आजही त्याच्या डोळ्यांसमोर लख्ख उभी आहे. अगदी 'शाळा' कादंबरीच सुरू झाली म्हणा ना नंतर! घरापर्यंत चकरा झाल्या, पण तेवढंच. बोलायची हिंमत नव्हतीच. आणि लगेच दहावी आली...
तापात दोन-तीन दिवस काही सुचू नये आणि एकदम घाम येऊन ताप उतरावा तशी दहावी आयुष्यात आली आणि गेली. त्या काळात कानशिलं तापायची, पण परीक्षेच्या टेन्शननं! स्वप्नाळू अवस्था कुलूपबंद करून कपाटात टाकून दिली. सकाळी लवकर उठायचो आणि क्लासला जायचो. अर्थात एवढं होतं, तरी सतत अभ्यास, अभ्यास केलं नाही, हेही खरं. आजूबाजूला काय काय घडत होतं! मंडल प्रकरणावरून देश तापला होता. व्ही. पी. सिंहांचं सरकार कोसळलं होतं आणि चंद्रशेखर पंतप्रधान झाले होते. आदल्याच वर्षी पं. नेहरूंची जन्मशताब्दी साजरी झाली होती आणि देशभर 'अपना उत्सव'मध्ये आम्ही नाचत होतो. टीव्हीवर बी. आर. चोप्रांचं 'महाभारत' सुरू होतं आणि बाहेर लालकृष्ण अडवाणींचं 'रामायण'! अडवाणींच्या अजेय वाटणाऱ्या रथयात्रेचा अश्वमेध बिहारमध्ये लालूप्रसादांनी अडविला होता आणि त्यांना अटकही केली होती. आमची दहावीची सहामाही संपली आणि लवकरच ऐतिहासिक असं १९९१ हे वर्ष उजाडलं. या वर्षाचं आपल्या देशाच्या आणि वैयक्तिक माझ्याही आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. देशाच्या आयुष्यात विसाव्या शतकातलं १९४७ व १९७७ नंतरचं तिसरं आणि महत्त्वाचं स्थलांतर घडणार होतं आणि माझ्याही आयुष्यातलं दुसरं आणि कदाचित कायमचं असं महत्त्वपूर्ण स्थलांतर घडणार होतं...

(क्रमश:)

---