31 Jul 2020

आपले छंद दिवाळी अंक लेख २०१९ - पाऊस

पाऊस... जनांतला, मनातला!
----------------------------------

पावसाळा म्हटलं, की आयुष्यातल्या काही ओल्याचिंब आठवणींची सर बरसू लागते. पावसाळ्यातल्या खाण्याप्रमाणेच या काळातल्या आठवणीही चटक-मटक चवीच्या असतात. काही कांदा-भज्यांसारख्या कुरकुरीत अन् खुसखुशीत, तर काही लालजर्द मिसळीच्या तर्रीप्रमाणे झणझणीत... काही वाफाळत्या चहाच्या स्वादासारख्या तरतरीत, तर काही विशेष पेयांसारख्या मादक अन् उत्तेजक... पावसाळ्यातल्या पायवाटेप्रमाणेच काही आठवणीही निसरड्या, तर काही आठवणी दुष्काळासारख्या - कायमचा घाव घालून गेलेल्या! ते काहीही असलं, तरी पावसाळी आठवणींच्या गमती-जमतींची सर इतर कुठल्याही आठवणींना नाही.
लहानपणीचा पाऊस खेळगड्यासारखा सोबत करायचा. पाऊस सुरू झाला, की 'गाड्या गाड्या भिंगोऱ्या' करत खेळ सुरू व्हायचा. पावसात मुक्तपणे भिजणं लहानपणी जसं जमलं, तसं नंतर कधीच जमलं नाही. नंतर सामाजिक रीतीरिवाजांचा आणि 'कोण काय म्हणेल' या भीतीचा रेनकोट जो अंगात चढला, तो नंतर उतरणं शक्यच झालं नाही. पावसाचा थेंब जेवढा शुद्ध तेवढंच तो झेलणारं निरागस बालपणही शुद्ध! ही अशी अंतर्बाह्य स्वच्छता नंतर फारशी वाट्याला आली नाही. 'दाग अच्छे है' असं मनाला पटवत राहणं एवढंच राहिलं. बाकी त्या लहानपणी कोसळणाऱ्या त्या पावसानं अविरत, संततधार आनंदच दिला. कागदी होड्यांचं आणि प्रत्येकाच्या बालपणाचं एक अद्भुत नातं आहे. म्हणून तर कवीला 'वो कागज़ की कश्ती, वो बारीश का पानी' असं लिहावंसं वाटलं. या कागदी होड्या करून पाण्यात सोडण्यात एक अपरिमित आनंद असायचा. पावसाच्या पाण्याशी आपलं नातं जुळवणारी ती चिमुकली होडी पाच-दहा फूट पळायची आणि पुढं कुठं तरी ओली होऊन बुडायची तरी किंवा फाटून संपून तरी जायची. आपलं बालपणही असंच संपून जातं. पण त्या ओल्याचिंब आठवणी मागे राहतात.
पावसाचा आणि शाळेचा संबंधही असाच 'लव्ह-हेट' पद्धतीचा. 'सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?' हे बालगीत एवढं अफाट लोकप्रिय होण्यामागे पावसाचा आणि सुट्टीचा असलेला अन्योन्य संबंधच असावा. आपल्याकडं शाळा आणि पाऊस दोन्ही एकदमच जूनमध्ये सुरू होतात. त्यामुळं शाळेच्या अत्यावश्यक खरेदीत शहरांत तरी रेनकोट आणि छत्री असतेच. माझं बालपण तालुक्याच्या गावात गेलं. कित्येक मुलांच्या पायांत चपलांचादेखील पत्ता नसायचा, तिथं रेनकोट आणि छत्र्या कुठल्या असायला? अनवाणी पावलांनी, चिखलयुक्त रस्ता तुडवत शाळेला जायचं. आमच्या शाळेभोवती कधी तळं साचून सुट्टी मिळाली नाही, पण शाळेच्या मागेच एक तळं होतं. तिथं म्हशी डुंबत असायच्या. वर्गातून कधी कधी ते दृश्य दिसायचं. बाहेर पाऊस कोसळत असताना वर्गात बीजगणित, भूमिती वगैरे विषय बोअर व्हायचे. पण मराठी, इतिहास, भूगोल असे विषय आवडायचे. त्यातही मराठीतल्या कविता शिकायला, ऐकायला मजा यायची. भूगोलातही 'पाऊस कसा पडतो' इथपासून ते बारमाही नद्या, धरणं यांची माहिती वाचताना समृद्ध झाल्यासारखं वाटायचं. पाऊस आणि आपलं जगणं यांचा काही तरी फार महत्त्वाचा संबंध आहे, हे शाळेतच समजायचं. मग 'मान्सून' आणि त्याच्या नाना कळा शिकायला मिळाल्या. शाळेतले पहिले काही दिवस म्हणजे नव्या कोऱ्या पुस्तकांच्या वासाचे आणि पावसाने ओल्या झालेल्या धरतीच्या वेडावणाऱ्या सुगंधाचे...! या दिवसांचं स्मरणरंजन म्हणजे जगातल्या सर्वांत मौल्यवान अत्तराची कुपी! कधीही उघडावी आणि त्या धुंद वासानं मन नादावून जावं... याच काळात शाळेत नवे मित्र यायचे. काही सोडून जायचे. तेव्हा लहानपणी मित्रांना, नातेवाइकांना पोस्टानं कार्डं लिहायचो. खुशाली कळविण्यामधला महत्त्वाचा मजकूर हा पावसासंबंधीचा असायचा. इकडं पाऊस सुरू आहे, तुमच्याकडं येतोय का, असा मजकूर असायचाच. मित्राचं पत्र आलं, की तो पूर्ण दिवस आनंदात तरंगत राहायचं. पुनःपुन्हा ते पत्र काढून वाचायचं. जरा मोठे झालो आणि वर्गात मुलीही आल्या! मग आयुष्य निरागस राहिलं नाही. अर्धवट वय होतं. काही कळायचं नाही. पण पलीकडल्या बाकांविषयी काही तरी आतून गुदगुल्या करणारं असं वाटायचं. पाऊस हा तर अशा भावनांना खतपाणी घालणारा रोमँटिक ऋतू. मग मनातल्या मनातच पाऊस पडायचा, इंद्रधनूही उगवायचं, चंद्रही दिसायचा, चांदणंही लखलखायचं. असा सगळा निसर्ग शरीराच्या पेशीपेशींत कसल्या तरी अनाम आकर्षणाची पेरणी करून जायचा. त्या वयातले ते सगळे दिवस सगळेच असायचे. त्या वेळच्या सगळ्या नाजूक भावनांना पावसाची सोबत असायची. म्हणून तर स्मरणरंजनाचा एक धागा पावसाशी कायम जोडलेला असतो. पाऊस पडू लागला, की मागच्या सगळ्या पाऊसवेळा आठवतात आणि डोळ्यांत पुन्हा पाऊस उभा राहतो. चांगल्या आठवणींची याद येते, तशाच काही गमतीशीर आठवणी आठवून हसायलाही येतं. पावसात अनेकदा झालेली फजिती आठवते. समोरच्या गाडीनं आपल्या शाळेच्या नव्या कोऱ्या ड्रेसवर उडवलेली चिखलाची नक्षी आठवते आणि आपण चिडून त्या गाडीच्या दिशेनं फेकलेले दगड आठवतात. मित्राच्या घरी वाढदिवसाला जाताना, छत्री न घेताच निघाल्यानं पावसानं नवे कोरे कपडे भिजलेले आठवतात. तशाच अवस्थेत तिथं कापलेला केक, नंतर मित्राच्या लक्षात येऊन त्यानं बदलायला दिलेले कपडे... असं सगळं आठवत जातं. न वाळणारे कपडे हा तर एक थोर प्रकार याच काळात घडत असतो. ते कपडे वाळवण्यासाठी घाईघाईत केलेली इस्त्री आणि कधी तरी त्या नादात कपडेच जाळून टाकण्याचे किस्से हे सगळं आठवतं.

लहानपणचा पाऊस आणि तेव्हाच्या आठवणीही अशा निरागसच असतात. मग आपण मोठे होतो. पावसाच्या आणखी गमतीजमती कळू लागतात. आपण वयात येऊ लागतो, तसतशी कविता नावाची एक गोष्ट आपल्या आयुष्यात येऊन दाखल होते. एखाद्या बोअर तासाला किंवा ऑफ तासाला, बाहेर तुफान पाऊस कोसळत असताना वहीच्या मागच्या पानावर कवितेसारख्या कुठल्याही चार ओळी खरडल्या नाहीत, असं क्वचितच कुणी असेल! या कवींचं आणि पावसाचं नातं काय विचारता! अहाहा! यांचं नातंही गमतीशीर, पण प्रेमाचं! मुळात समस्त पावसाळी कवीमंडळींनी पावसाला प्रियकर किंवा प्रेयसीचीच उपमा देऊन त्याला अगदी आपल्यातलाच एक करून टाकलाय. पावसाळा सुरू होण्याची नुसती चर्चा जरी झाली, तरी कवीमंडळींना कविता 'होतात', म्हणे. पण खरंच पाऊस हा सर्जनाचाच ऋतू आहे. आपली सगळी परंपरा कृषीसंस्कृतीची आहे. या कृषीसंस्कृतीत पावसाचं महत्त्व काय, हे सांगायला नकोच. पहिल्या बीजाचं रोपण आणि भरणपोषण व्हायला पहिला पाऊस पडायलाच हवा. शेतीतलं धनधान्य हे समृद्धीचं प्रतीक, तसंच सर्जनाचंही! त्यामुळंच नवं काही उगवून येण्यासाठी पावसाची हजेरी ही हवीच. अगदी मनातल्या भावभावना उमलून येण्यासाठीही आजूबाजूचा निसर्ग अनुकूल असावा लागतो. कडक उन्हात, घामाच्या धारा लागलेल्या असताना प्रेमकविता सुचणं अंमळ कठीणच. याउलट थंडगार वारं सुटलं, जमीन शांतावली, झाडं हलू लागली आणि पाऊस आला, की आपल्या मनातल्या सर्जनालाही सहजीच अंकुर फुटतात. ही अभिव्यक्ती बाहेरच्या कुणाला भले कितीही हास्यास्पद वाटो, आपल्याला ती आनंदच देऊन जाते. जगण्यासाठीचं एक सबळ कारण पुरवून जाते. पावसाबरोबरच आपल्याही आतून काही तरी फुलून येतंय, ही भावना वास्तविक आनंदाचीच. पण आपल्याकडं या अभिव्यक्तीची नीट कदर होत नाही. 
कवी आणि पावसाच्या कविता यांची जेवढी टर उडविली गेली असेल, तेवढी अन्य कशाचीही उडविली गेली असेल, असं मला वाटत नाही. वास्तविक पाऊस पडला, की सगळ्यांनाच छान वाटतं. हे छान वाटणं शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर असतं. उन्हाळ्यातला असह्य दाह कमी झालेला असतो. शरीराची तलखी संपून जाते. मग आपोआप चित्तवृत्तीही फुलून येते. अशा वेळी माणसाला व्यक्त व्हावंसं वाटतं. मग कुणी गाणं म्हणतं, तर कुणी चित्र काढतं, कुणी नाचायला लागतं, तर कुणी वाद्य वाजवतं, कुणी भटकायला जातं, तर कुणी फोटो काढतं... या सगळ्यांत कविता करणं सगळ्यांनाच सोपं वाटतं. 'ट'ला 'ट' जोडला, की झालं. बालकवी किंवा कुसुमाग्रजांसारखी प्रतिभा सगळ्यांकडे कुठून येणार? मग सुमार कवितांचं एक वेगळंच पीक येतं. या कविता पूर्वी खासगी मैफलींत किंवा फार तर वृत्तपत्रांतच पाहायला मिळत. आता सोशल मीडियामुळं प्रत्येकाला आपली ती 'खास' पावसाळी कविता टाकायची संधी मिळाली आहे. मग ती कोण सोडणार? कांदाभज्यांचं आणि या पावसाळी कवितांचं प्रस्थ फारच वाढलं, तशी मग आपोआपच त्यांची टिंगल व्हायला लागली. पावसाळ्यात होणाऱ्या काव्य मैफली म्हणजे तर अचाट प्रकार असतो. तोटी नसलेल्या नळातून अखंड पाणी गळत असावं, तसं या कथित मैफलींतून कवितांमागून कविता गळू लागतात. इयत्ता पाचवी 'ब'मध्ये शिकणाऱ्या एखाद्या वर्षाराणीपासून ते विद्यापीठात पीएचडी सादर करणाऱ्या एखाद्या प्रा. जोशीकाकांपर्यंत सगळ्यांनाच कविता होऊ लागतात आणि त्या ऐकवण्याची खुमखुमीही येते. अशा वेळी 'आलिया भोगासी असावे सादर' म्हणत त्या कविता ऐकणे हा एकच पर्याय उरतो. तिकडं गुलज़ारांनी 'एक अकेली छत्री में जब आधे आधे भीग रहे थे' लिहिलं, की आमच्याकडच्या नवोदित कवीनं 'पावसात जाताना दिसलीस तू, स्वप्नातल्या परीवाणी भिजलीस तू, माझ्याकडं होती एक छत्री, पण त्यात तू येईनास भित्री' वगैरे लिहून त्यावर सूड उगवलाच म्हणून समजा. 'कविता म्हणजे आकाशीची वीज. ती धरू पाहणारे शंभरातील नव्व्याण्णव जण जळून खाक होतात,' वगैरे केशवसुतांनी म्हटलं असलं, तरी पावसात हे नवोदित कवीलोक कवितांपाठोपाठ कविता सादर करून समोरच्या प्रेक्षकांवर विजा कोसळवत असतात. समोरच्या शंभरपैकी नव्व्याण्णव श्रोते त्यात जळून खाक होतात. (जो एक उरतो, तोही शेवटी उठून मंचावर जातो आणि आपली कविता सादर करतो.) पावसाळ्यात माणसाच्या पचनसंस्थेवर एकूणच विपरीत परिणाम होतो. त्यामुळं पावसाळ्यातच आपल्याकडं चातुर्मास पाळतात. वांगी आदी वातुळ पदार्थ खाण्यातून वर्ज्य केले जातात. मात्र, कवीमंडळी बहुदा चातुर्मास पाळत नसावेत. त्यामुळं ते कविता सादर करायला मंचावर आले, की त्यांच्यातली वातप्रकृती जागी होते. ते वेडवाकडे हातवारे करू लागतात. प्रेमळ कविता असेल, तर ठीक; पण कवितेत बंडखोरीची 'वात' पेटलेली असली, तर प्रेक्षकांना वात आलाच म्हणून समजा. हे असलं वातुळ खाऊन, बिघडलेल्या पोटानं केलेली निर्मिती कशी काय सकस वगैरे असेल! 
पावसाळ्यातच अनेक प्राणी, पक्षी व कीटकांचा मीलनाचा काळ येतो. बेडूक आदी मंडळी त्यांच्या उन्हाळी निद्रेतून जागे होऊन मादीसाठी 'डराव डराव'ची आर्त साद घालू लागतात, तशीच काही कवी मंडळी आपल्या उन्हाळी 'हायबरनेशन'मधून जागे होऊन फेसबुकादी 'सायबर नेशन'मध्ये प्रविष्ट होतात आणि प्रेमकवितांचा रतीब घालून, 'जे 1 झालं का?' असं विचारायला कुणी आपल्यासारखीच विव्हल कवयित्री भेटते का, ते बघू लागतात. श्वानजगतातील 'भाद्रपदा'ची ख्याती तर प्रसिद्धच आहे. ते बिचारे प्राणी असल्यानं त्या एकाच महिन्याशी एकनिष्ठ असतात. 'सायबर नेशन'मध्ये बाराही महिने 'भाद्रपद' सुरू असतो. थोडक्यात, प्राणी, पक्षी, कीटक यांच्याप्रमाणेच माणूस या प्राण्याच्याही रोमँटिक वृत्तीला या पाऊसकाळात अगदी बहर येतो. वेगळ्या अर्थानं 'सर्जनशीलते'चा अक्षरशः धुमाकूळ सुरू होतो. अशा वेळी पावसाळ्यात बुंदी पाडावी तशा कविता पाडणाऱ्या कवीमंडळींच्या कवितांमध्ये प्रेमकवितांना पूर यावा, यात नवल नाही. चारोळ्यांपासून ते कथित खंडकाव्यापर्यंत प्रेमाचे नाना आविष्कार कवितेतून बदाबदा कोसळू लागतात. या अशा प्रेमवीरांना पावसाळी पर्यटनाचा किडा चावला, की मग तर काही विचारायलाच नको! पाऊस सुरू झाला रे झाला, की जवळचा एखादा गड, एखादा ओसाड किल्ला, एखादं बारकुडं धरण किंवा कुठल्या तरी शंकराचं डोंगर-दरीत असलेलं देवस्थान गाठायला या प्रेमवीरांची अगदी झुंबड उडते. एखाद्या तळ्यावर शेवाळं साठावं तसे त्या किल्ल्यावर किंवा गडावर या प्रेमीलोकांची गर्दी दिसते. बाइक चालविणाऱ्या, एखाद्या लुकड्यासुकड्या आणि झँगपँग गावठी गॉगल लावणाऱ्या हिरोच्या मागं तशीच कडकी कन्यका बसलेली असते. त्याला तो सलमान आहे असं वाटत असतं आणि तिला कतरिना! अशा या प्रेमवीरांच्या टोळ्याच्या टोळ्या वानरांसारख्या या गडावरून त्या गडावर (किंवा खरं तर या झाडावरून त्या झाडावर) उड्या मारत असतात. प्रेमात पडलेल्यांना कुठलीही भीती अथवा लज्जा नसते, हे जगजाहीर आहे. त्यामुळं ऐतिहासिक वारसास्थळं असलेल्या त्या वास्तूंच्या सान्निध्यात ही मंडळी वेगळाच इतिहास लिहिण्याच्या मागं लागलेली असतात. तरी पूर्वीचे ते वासू आणि सपना आता पुष्कळ कमी झाले. तरी काळ्या दगडी भिंतींवर पांढऱ्या खडूनं बदाम वगैरे काढून त्यात तिरका बाण रेखाटून मध्ये आपलं नाव लिहिणारी दिवटी जमात अजूनही पूर्णपणे संपलेली नाही. कुठल्याही प्रेमवीराला सर्वांत गरजेची गोष्ट कुठली आहे, असं विचारलं, तर तो सांगेल - आडोसा! उडप्याच्या हॉटेलमध्ये गेल्यावर कुठला डोसा पाहिजे, असं विचारल्यानंतर 'आडोसा' असं उत्तर देणारी हीच ती जमात! एकदा हा तो आडोसा नवसानं लाभला, की यांच्या पुढच्या सगळ्या नवसांची तयारी जवळपास तिथंच पूर्ण होते. रंगीत तालीमच म्हणा ना हनीमूनची! अनेकदा तर हा प्रेमालाप एवढ्या थराला जातो, की त्यांना जागं करून सांगावंसं वाटतं, 'मित्रा, अरे, हनीमूनसाठी थोडं शिल्लक ठेव रे... इथंच उरकणारेस का सगळं?' पण मग आपल्याला आपल्या टीनएजमधले दिवस आठवतात आणि 'आपलेच दात आणि आपलेच ओठ' म्हणून आपण गप्प बसतो. 
बाकी पावसाळा आणि प्रेमीजन यांचं हे नातं भारीच आहे. दर शनिवार, रविवारी लोकलला लटकून किंवा बाइकवर स्वार होऊन, लोणावळा गाठणारी अतिउत्साही तरुणाई बघायची. पाऊस पडल्या पडल्या एकदा सिंहगडावर जाऊन तिथली कांदाभजी खाणे आणि दुसरं म्हणजे लोणावळ्यात जाऊन त्या भुशी डॅमच्या पाण्यात उघडंबंब होऊन बसणे या दोन गोष्टी केल्या नाहीत, तर पुण्यातल्या तरुणाईमध्ये तो 'फाउल' धरला जातो. याशिवाय लवासा, मुळशी, हाडशी, ताम्हिणी, वरंध, माळशेज, आंबोली आदी ठिकाणं तर देवानं सह्याद्रीमध्ये खास पावसाळ्यात लोकांना वेडाचार करण्यासाठीच निर्माण केली असावीत, अशी दाट शंका येते. सह्याद्रीतली एकही धबधबा किंवा एकही घळ आता अनाघ्रात राहिली नसेल. प्रत्येक दगडा-दगडावर आमच्या 'दगडू आणि प्राजक्ता'ची प्रेमफुले पडलेलीच असणार. पण बाकी इतर कुठल्याही चाळ्यांपेक्षा धबधबे गाठून, त्याखाली उघडे होऊन भिजणे हा एक खास विशेष सोहळा आहे. पहिल्यांदा जाणाऱ्या हौशी पर्यटकांना हे जमत नाही. त्यासाठी विशेष नैपुण्य प्राप्त करावे लागते. धबधबा पर्यटनाची रेसिपी येणेप्रमाणे - एक तर तुम्ही एकटे-दुकटे जाण्यात अर्थ नसतो. किमान दहा लोकांचा ग्रुप घेऊन जावे. एसयूव्हीचे धूड सोबत नेले तर विशेष प्रभाव पडतो. त्यातही मोठमोठ्याने स्पीकरवर वाह्यात गाणी लावावीत. काचेतून मुंडके बाहेर काढून माकडालाही लाजवतील असे चाळे करावेत. आपण जेथे चाललो आहोत, त्या भागातला सर्वांत मोठा धबधबा निवडावा. तिथं गाडी शक्यतो रस्त्यात मधोमध लावावी. होता होईल तो सगळे कपडे गाडीतच काढून ठेवावे आणि अर्धनग्न अवस्थेत धबधब्याकडे कूच करावे. आपला अवतार बघूनच तिथले साधेसुधे लोक पळून गेले पाहिजेत. एका हातात मद्याची बाटली असेल तर ही दृश्यचौकट विशेष खुलते. नरड्यातून जेवढा शक्य आहे तेवढा किंकाळीसदृश टाहो फोडावा. आयुष्यात प्रथमच पाणी बघितल्यासारखा चेहरा करून, वेगवान हालचाली करून धबधबा गाठावा. मधली धार पकडून डोईवर घ्यावी. शक्य झाल्यास माकडासारख्या उड्या माराव्यात. नंतर आयुष्यात प्रथम अंगाला पाणी लागल्यासारखे सर्वांग घुसळावे. हे करताना किंचाळणे सुरूच ठेवावे. आपल्या या विलोभनीय कृतीने आसमंतातील पक्षी उडून जातील, कीटक दडून बसतील, सरिसृप वर्ग लपून जाईल आणि जलचर पाण्यातल्या पाण्यातच जीव देतील! हे साधलं तरच तुम्ही खरे व्यावसायिक, परिपूर्ण धबधबा पर्यटक! आपल्या राज्यात अशा अनेक व्यावसायिक पर्यटकांनी आपला सगळा सह्याद्री पादाक्रांत करून टाकला आहे. कवी केशवसुत म्हणाले होते, 'जिकडे जावे तिकडे माझी भावंडे दिसताहेत', त्याच चालीवर सह्याद्रीत कुठंही गेलं, की आपली ही महान पर्यटक भावंडे दिसतातच. त्यांना लांबूनच नमस्कार करावा आणि आपल्या वाटेनं चालू पडावं, हेच खरं.
पर्यटनासोबतच पावसात शहरातल्या शहरात आपली गाडी चालवण्याची गंमत अशीच न्यारी. पावसात चारचाकी बाहेर काढणारा हा, पुलंच्या भाषेत सांगायचं, तर आमच्या शहरात भोपळे बांधून पोहणाऱ्याएवढाच बावळट समजला जातो. इथं बाइकच हवी. त्यातही बाइकच्या मागच्या चाकाला मडगार्ड लावलेले असले, तर तो फाउल धरला जातो. जोरदार पावसात मागच्या चाकातून रस्त्यावरचे चिखलयुक्त पाणी मागच्याच्या अंगावर उडवत जाणे हे आमच्याकडे खऱ्या मर्दाचे लक्षण मानले जाते. पावसाळ्यात शक्यतो सिग्नल बंदच ठेवले जातात. उगाच लोकांना पावसात भिजत सिग्नलला उभे राहायला लागू नये, हाच त्यामागचा चांगला विचार असतो. अशा बेधुंद, बेभान वाहतुकीत आपली बाइक तीरासारखी काढत पुढं पुढं नेणं हे विशेषातले विशेष नैपुण्य मानले जाते. या शहरातला पोरगा वयाचे सोळावे वरीस गाठले, की लायसन्स मिळायच्या आधी हे कौशल्य प्राप्त करतोच. पावसाळ्यात नेहमीच्या रस्त्याने बाइक हाकणे हे तसे मागासलेपणाचे लक्षण मानले जाते. शक्यतो रस्त्याच्या डाव्या बाजूच्या फूटपाथवरून गाडी चालवत पुढं पुढं नेणे हेच खऱ्या कर्मयोग्याचे लक्षण होय. वरून धो धो पाऊस सुरू असताना सुपरफास्ट वेगात बाइक पळविणे याला वाघाचे काळीज लागते. आपल्या शहरातील हजारो युवकांनी हे काळीज कष्टाने मिळविले आहे. त्यात ती स्पोर्ट बाइक असेल आणि मागे एखादी कन्या बसली असेल, तर गाडीला विशेष वेग येतो. या गाडीचा पार्श्वभाग शेळीच्या शेपटासारखा असतो. 'धड माशीही वारली जात नाही आणि अब्रूही झाकली जात नाही,' अशी शेळीच्या शेपटाची स्थिती असते. तीच गत या बाइकची असते. उंचच उंच तिरकी चढत गेलेली मागची सीट आणि त्यावर समोरच्या मदनाच्या पाठीवर 'झोकून देऊन' बसलेली त्याची रती हे दृश्य बघून अनेकांना लहानपणी बघितलेली 'विक्रम और वेताल' मालिकाच आठवते. त्यात तो वेताळ त्या विक्रमाच्या पाठीमागे अगदी अस्साच बसलेला असतो. अशी ही भयावह जोडी रस्त्यातल्या प्रत्येकाला मरणभय दाखवीत मार्गक्रमणा करीत पुढे पुढे जात राहते, तेव्हा 'राम राम' म्हणत राहणं एवढंच आपल्या हाती उरतं.
पावसाळा आला, की आजारपण आलंच. ओल्या हवेनं कपडे वाळत नाहीत. घरभर सगळीकडं आतले बाहेरचे कपडे वाळत घातलेले दिसतात. त्या ओल्या वासानं कसंसंच व्हायला लागतं. पण इलाज नसतो. मग जुने कपडे बाहेर येतात. इस्त्र्या फिरवायला सुरुवात होते. ऑफिसची घाईची वेळ, त्यामुळं प्रत्येकाला सकाळी ऑफिसच्या दिशेनं धावत सुटायचं असतं. त्या घाईत आजारपण आलं, तर संपलंच. पण त्याला आपणच जबाबदार असतो, कारण या पावसाळी हवेत पाणीपुरी, भेळ, कांदाभजी, मिसळ असलं अरबट-चरबट खाण्याचा मोह होतोच. पोटाची इच्छा नसताना, जिभेचे लाड पुरवले जातात. मग कधी तरी पोटाचं बंड होतं. लगेच डॉक्टरकडं पळायची वेळ येते. नेमकी पावसाळ्यात सगळ्या डॉक्टरांची क्लिनिकं भरून वाहत असतात. खासगी हॉस्पिटलांमध्येही जागा नसते. सरकारी दवाखान्यांची अवस्था तर काही विचारूच नका. तिथली गर्दी बघून आजारी पडल्याचा पश्चात्ताप झाल्याशिवाय राहत नाही. खरं तर कुठलं तरी साधंसं इन्फेक्शन होतं आणि आपलं नाक पार चोंदून जातं. बाहेरची गर्दी आधीच असह्य झालेली असते, त्यात ही आतली सर्दी! अशा वेळी मग माणूस सर्द न झाला तरच नवल! थोडक्यात निभावलं, तर ठीक; नाही तर हॉस्पिटलात अॅडमिट व्हायची वेळ येते. तिथल्या गमती-जमती आणखी वेगळ्या. पावसाळी हवेत औषधांचा वास मिसळला, तर असह्य असा वास तयार होतो. हा वास नाकात बसला, तर जगणं असह्य होऊन जातं. त्यामुळं शक्य तो आजारी पडू नये, याकडं लक्ष द्यावं. पावसाळ्यात सगळ्यांत आनंदी असतात ते डॉक्टर, असं म्हटलं जातं ते काही खोटं नाही. 'यमज्येष्ठसहोदरा'चं सगळं देणं देऊन झालं, की आपले खिसे पूर्ण रिकामे झालेले असतात, हे नंतर लक्षात येतं.
असा हा पावसाळा... अस्मादिकांना हा ऋतू आवडतो, नाही असं नाही. पण पावसाळा सुरू होताना मन उदास होतं, हेही खरं. याचं कारण शाळा आणि कॉलेजमधल्या दिवसांशी आहे. मोठ्या शहरात पहिल्यांदाच शिकायला आलेल्या मुलांना हा अनुभव आलेला असेल. शहरातली सर्व मोठी कॉलेजे आणि शिक्षण संस्था भक्कम दगडी बांधकामात उभ्या आहेत. तिथं जाताना त्या थंडगार इमारतीचंच दडपण येतं. आपल्या छोट्या घरातल्या भिंती देत असलेली ऊब इथं अजिबातच नसते. उलट त्या दगडी भिंतींचा अजस्र थंडपणा अंगावर येतो. आपण एकटेच असतो. कुठं तरी होस्टेलला नुकताच प्रवेश मिळालेला असतो. गावातले आत्तापर्यंतचे मित्र आता दुरावलेले असतात. इथून पुढचा प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा असतो. सगळंच नवीन असतं. अशाच वातावरणात मान्सूनचा संततधार पाऊस सुरू होतो. होस्टेलच्या दाट झाडी असलेल्या इमारतीभोवती अजूनच अंधारून येतं. अशा वातावरणात वर्गात जावंसं वाटत नाही. गेलो तरी शंभर अनोळखी मुला-मुलींमध्ये एकटं एकटं वाटू लागतं. उंच छताच्या कोपऱ्यात वळचणीला बसलेल्या भिजलेल्या एकांड्या कबुतरात आणि आपल्यात विलक्षण साम्य वाटायला लागतं. लेक्चरमधे लक्ष लागत नाही. मुळात काय शिकवत आहेत, तेच समजत नाही. लेक्चर संपलं, की आपण गुपचूप बाहेर येतो. बाहेर सगळी मुलं हसत-खिदळत कँटीनला जातात. आपल्याला अजूनही कुणी जवळचं मित्र नसतं. होस्टेलच्याच तीन-चार मुलांचा ग्रुप जमतो. आपण बळंच त्यांच्यात सामील होतो. कँटीनला गेलो, तरी त्यांच्या गप्पांमध्ये इंटरेस्ट वाटत नाही. गावची, घराची आठवण येत राहते. बाहेरचं कुंद वातावरण पावसामुळं अजूनच दमट-घामट-कोंदट झालेलं असतं. आपल्याला आतल्या आत गुदमरायला लागतं. आत्ताच्या आत्ता गाडी पकडून गावी निघून जावं, असं वाटू लागतं.
अशा वेळी मग जे भाग्यवान असतात, त्यांना कुणी तरी जिवा-भावाचं माणूस भेटतं. मग ते आयुष्यभर आपल्या लक्षात राहतं. हातात हात गुंफले जातात आणि पावसाळा सुखाचा होतो. पुढचे सगळे पावसाळेही सुखाचे जातात. आयुष्यभर आनंदाच्या सरी कोसळत राहतात. दुर्दैवानं ज्यांना कुणी भेटत नाही, त्यांच्या आयुष्यात पुढंही गावातल्यासारखाच दुष्काळी रखरखाट कायम राहतो. कुठंच कसलीच ओल म्हणून राहत नाही. आपण आतून आतून कोरडे होत जातो. पाऊस असतानाही रडवतो आणि नसतानाही रडवतो, तो असा!
म्हणूनच पावसाळा म्हटलं, या अशा ओल्या आठवणी मनात दाटून येतात. त्यातल्या काही जनांतल्या असतात, तर काही मनातल्या! ज्या जनांतल्या असतात, त्या गमतीदार असतात; पण ज्या मनातल्या असतात, त्या कधी मोरपिशी असतात, तर कधी कडव्या...!! 
तो पाऊस मात्र सर्व काळ सारखाच असतो - अगदी स्वच्छ, निर्मळ अन् पवित्र!!

---

17 Jul 2020

रिव्ह्यू – जानू

हरवलेल्या मोरपिसाची मधुर मोहिनी...
----------------------------------------------


शाळेत असताना प्रेमात पडतोच आपण. तेव्हा कळतच नसतं, की त्या प्रकाराला नक्की काय म्हणायचं? प्रेम असतं का खरंच? की त्या पौगंडावस्थेतलं केवळ शारीरिक आकर्षण? काहीही म्हणा, पण कुणी तरी आवडतं, बस्स... आणि मग बाकी काही सुचतच नाही. हवेवर तरंगणाऱ्या मोरपिसासारखं मन हलकं हलकं होऊन जातं. समोर फक्त ती (किंवा तो) दिसत राहते. अहोरात्र तिचाच विचार मनात येत राहतो. पण मनातलं प्रेम व्यक्त करता येतंच, असं नाही. शंभरातल्या किमान ८० जणांना तरी ते नसेलच करता येत! नकाराची भीती वाटत राहते, विशेषतः मुलांना.... पुढं शाळा संपते. आपापले रस्ते वेगळे होतात. पुढं लग्नं होतात, संसार सुरू होतात. तरी ती सध्या काय करते याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. हल्ली फेसबुक, व्हॉट्सअपसारख्या माध्यमांमुळे जुन्या मित्र-मैत्रिणींना पुन्हा भेटणं सहज शक्य झालंय. शाळांची रियुनियन म्हणजे जुन्या प्रेमांची गॅदरिंगंच झालीयत जणू. तिथं बहुतेकांना आपापलं जुनं प्रेम दिसतं. वस्तुस्थितीचं भान येतं आणि मनातलं मोरपीस मनातच कोमेजून जातं. काही भाग्यवानांचं मात्र प्रेम टिकतं... कायम राहतं. अशा भेटीच्या वेळी मग हृदय दहावीतल्यासारखंच दुप्पट वेगानं धडधडू लागतं. जुन्या आठवणी आषाढातल्या कृष्णघनांसम आवेगानं कोसळू लागतात. मेंदू बधिर होतो. हाता-पायांना कंप सुटतो... ती अशी समोर येते आणि आपण अक्षरशः कोसळतो. नंतर आपल्याला कळतं, की ती परदेशातून आलीय. मोठ्या मुश्किलीनं मुलीला घरी ठेवून तिनं यायचं जमवलंय. पहाटेच्या फ्लाइटनं ती परत जाणार आहे. हातात केवळ काही तास आहेत. तिचा सहवास लाभणार आहे तो तेवढाच काळ... आता या काळातल्या प्रत्येक क्षणावर कादंबरी होऊ शकते, महाकाव्य लिहिलं जाऊ शकतं, कवितांचा पूर येऊ शकतो आणि आठवणींच्या चांदण्यांनी मनाचं आकाश लखलखू शकतं.
सी. प्रेमकुमार दिग्दर्शित 'जानू' या तेलगू चित्रपटाचं कौतुक अशासाठी, की त्यानं या सर्व शक्यता आजमावल्या आहेत. प्रेमाची नवी गाथा सांगितली आहे. खरं तर ती नवी नाहीच, पण तिच्यातली तरलता मात्र नवी भासू शकते. आपल्या आजूबाजूचं सर्व जग आणि एकूणच अभिव्यक्ती व्यवहारी आणि रोकडे हिशेब मोजणारी होत असताना, एवढं नितळ, स्वच्छ काही असू शकतं का, यावरचा आपलाच विश्वास उडण्यासारखी परिस्थिती आहे, म्हणूनही ही तरलता नवी भासू शकते.
खरी गोष्ट अशी आहे, की या कलाकृतीतून आपल्यात पूर्वी असलेली आणि आता कुठे तरी हरवून गेलेली निरागसता आपल्याला अशी जुन्या प्रेयसीसारखी अवचित गवसते. त्या प्रेमातील निरागसता आणि निरागसतेवरचं आपलं प्रेम दोन्ही आत्ताच्या रुक्ष जगात गवसण्याची एक शक्यता ही कलाकृती निर्माण करते आणि म्हणूनच मला तिचं खूप खूप मोल वाटतं. 
चित्रपटाची सुरुवात आणि मध्यंतरापर्यंतचा भाग एरवीच्या शालेय प्रेमपटांसारखाच पुढं सरकतो आणि आपल्याला पुढं काय होणार याचा काहीसा अंदाज येतो. मात्र, चित्रपटाची खरी जान आहे तो याचा उत्तरार्ध. तो फक्त आपल्या नायक-नायिकेचा आणि त्यांच्यातल्या त्या खास क्षणांचा आहे. प्रेम म्हणजे नक्की काय, याचा काहीएक अदमास यातून येऊ शकतो. ज्यांनी कधी तरी एकदा का होईना, असं निस्सीम प्रेम केलंय, त्यांना यातल्या अबोध प्रेमाची तरलता कळू शकेल. नायक-नायिका एकदाही अंगचटीला न येता, शारीर स्पर्शाविना प्रेमाचं एवढं उत्कट दर्शन घडवू शकतात, यावर हल्ली कुणाचाच विश्वास बसायचा नाही. पण जानू असं प्रेम दाखवतो. किंबहुना हा अशक्य वाटणारा प्रेमाचा पैलू फार ठळकपणे दाखवतो आणि त्यातली हवीहवीशी अशक्यता स्वप्नवत सत्यात उतरवून दाखवतो. म्हणूनच भिडतो.
'जानू'चा सगळा प्राण हा त्या दोघांच्या त्या अव्यक्त क्षणांमध्ये आहे. तिला लिफ्ट द्यायची आहे हॉटेलपर्यंत... तिथून पहाटे एअरपोर्टला सोडायचंय.... मधल्या काळात भूतकाळाची सगळी उजळणी होते. कुठं काय चुकलं हे समजत जातं. ती उन्मळून पडते. एक लहानशी चूक निमित्तमात्र झालेली असते. आता काळाची चक्रं उलटी फिरवणं अशक्यच असतं. पण फ्लाइटची वेळ होईपर्यंतचा प्रत्येक क्षण तिला त्याच्यासोबत काढायचा असतो. मग दोघे हॉटेलमधून बाहेर पडतात. तिला त्याला दहावीच्या रूपात पाहायचं असतं. मग सलूनमध्ये जाऊन आधी ती त्याची दाढी करवून घेते. नंतर शहरातल्या सुनसान रस्त्यांवर दोघे भटकत राहतात. प्रत्येक क्षण असोशीनं जपू पाहतात. मेट्रोनं फिरतात. कॅफेमध्ये जातात. तिथं त्याच्या विद्यार्थिनी भेटतात. तिला त्याची पत्नी समजतात. गप्पा मारतात. तीही भूतकाळातली घटना तिला जशी घडायला हवी होती, तशी रचून सांगते. तो ती ऐकताना अस्वस्थ होतो. अखेर त्या मुली जातात. नंतर त्याच्या घरी जातात दोघं. दारातून पाऊल आत टाकताना आवर्जून तो तिला उजवा पाय आधी टाकायला सांगतो. पावसानं भिजलेली ती त्याच्या बाथरूममध्ये जाते. अंघोळीला त्याचाच साबण वापरते. तो संकोचानं तिला टॉवेल व त्याचे शर्ट देऊ पाहतो. ती निश्चिंतपणे त्याचा शर्ट घालते. शर्टचा गंध घेऊन पाहते... तो कॉफी करतो... गॅलरीत दोघं गप्पा मारतात... तिला त्याचं लग्न व्हावं, असं वाटतंय, त्याला मुलं झालेली बघायची आहेत. ती हे सगळं असोशीनं त्याला सांगत राहते... त्याला भूक लागलेली असते. ती त्याच्या स्वयंपाकघरात जाते, खायला करते. तो तिच्यासमोर बसून मांडी घालून बसतो आणि खात राहतो. तिच्यातल्या प्रेयसीतलं हे मातृस्वरूप दर्शन प्रेमाची उच्च प्रत दाखवून जातं. एका टप्प्यानंतर हेच उरतं ना खरं तर... एकमेकांची काळजी, जिव्हाळा, माया.... एवढंच राहतं. शारीर आकर्षणापलीकडं गेलेलं हे प्रेम... अचानक लाइट जातात. तो बॅटरी आणायला धावतो. ती एकदम 'यमुना तटी...' म्हणायला सुरुवात करते. राधाकृष्णाचं हे गाणं... त्यानं शाळेत अनेकदा फर्माइश करूनही तिनं कधीच न म्हटलेलं! आज असं अचानक त्याच्या घरात ती म्हणते. त्यांच्यातल्या उत्कट प्रेमाचा हा सर्वोच्च क्षण असतो... ती शांतपणे त्याच्या बेडवर पडते. श्रमानं तिचा डोळा लागतो. तो खाली जमिनीवर निजतो. पण झोप येत नाहीच. तो पाहत राहतो तिच्या झोपलेल्या निरागस चेहऱ्याकडं... आता काही काही नको असतं. हृदय उचंबळून येतं, मन भरून येतं.... 'क्षण एक पुरे प्रेमाचा', तो हाच...
अखेर तिचा जाण्याचा क्षण येतो. दोघं तिच्या हॉटेलवर येतात. कारनं एअरपोर्टला जायला निघतात. एअरपोर्ट जवळ येतो, तसं तिला जाणवतं, की हे सगळं लवकरच संपणार आहे. तिचा हात नकळतपणे गिअरवर जातो. तो बघतो. तिच्या हातावर हात ठेवून गिअर बदलत राहतो. शेवटी ती न राहवून म्हणते, मला अजून तुझा थोडा वेळ हवाय. मग तो चक्क तिच्या विमानाचं आणखी एक तिकीट स्वत:साठी काढतो. दोघंही आत जातात. मूकपणे एकमेकांची सोबत अनुभवत राहतात. पण शेवटी ताटातुटीचा प्रसंग पुन्हा येतोच. सगळे बांध फुटतात.... ती त्याच्या गळ्यात पडू पाहते. पण सावरते लगेच आणि विमानाकडं धावत सुटते. तो घरी येतो. दहावीनंतर तिनं शाई शिंपडलेला शर्ट आणि आत्ता तिचा ‘विसरलेला’ कुर्ता तो बॅगेत बंद करून ठेवतो. मोरपीस पुन्हा वहीत जातं.... मन एकाच वेळी रिक्तही असतं आणि तृप्तही...
शर्वानंद (राम) आणि जानकी उर्फ जानू (समंथा रुथ प्रभू) या दोघांचा अभिनय केवळ लाजवाब. त्यातही समंथानं साकारलेली जानू केवळ अप्रतिम. अनेक शांत, संथ क्षणांमध्ये अर्थ उतरवण्याचं अवघड काम या दोघांनीही फार उत्कृष्ट पेललंय. 
शाळेत एकदा तरी प्रेम केलेल्यांना नक्की आवडेल असा हा सुंदर चित्रपट चुकवू नका.

----

दर्जा – चार स्टार

-----------------------