19 Oct 2020

डीडीएलजेवरील ‘मटा’ लेख

एका ‘स्वप्ना’ची पंचविशी 
----------------------------- 


‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा यशराज फिल्म्सचा चित्रपट प्रदर्शित झाला, त्याला येत्या २० ऑक्टोबर रोजी २५ वर्षं पूर्ण होतील. ‘यशराज फिल्म्स’ला २५ वर्षं पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर १९९५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आज यशराज फिल्म्सचा सुवर्णमहोत्सव आणि ‘डीडीएलजे’चा चक्क रौप्यमहोत्सव साजरा होतोय. केवढा काळ बदलला! काही पिढ्या बदलल्या... मात्र, ‘डीडीएलजे’ची जादू कायम राहिली आहे. एखादा चित्रपट जन्मताना सर्व शुभयोग एकत्र यावेत, तसं ‘डीडीएलजे’चं झालं असावं. हा सिनेमा म्हणजे एक दंतकथा ठरला. हिंदी चित्रपटसृष्टीतला सर्वाधिक काळ चाललेला चित्रपट हे त्याचं बिरुद तर ध्रुवताऱ्यासारखं अढळ राहील, असं वाटतंय. एकाच चित्रपटगृहात सर्वाधिक काळ चाललेला हाच चित्रपट! हिंदीतला सर्वाधिक यशस्वी रोमँटिक चित्रपट हाच! लोकप्रियतेचे उच्चांक गाठून नवनवे माइलस्टोन तयार केले ते याच चित्रपटानं...! या चित्रपटातील संवाद, गाणी, एकेक दृश्य प्रचंड गाजलं. पुढं अनेक वेळा त्याची कॉपी झाली. ‘राज’ आणि ‘सिमरन’ ही भारतीय प्रेमकथांमधली ‘सर्वनामं’ झाली. विशेषनामांचं सर्वनाम होणं यापेक्षा लोकप्रियतेचा आणखी कोणता मोठा पुरस्कार असेल! सुरुवातीला हा चित्रपट नाकारणाऱ्या शाहरुखच्या करिअरमधला हा सर्वांत यशस्वी सिनेमा ठरला. या चित्रपटानं त्याच्या सुपरस्टारपदावर शिक्कामोर्तब झालं. काजोलला या चित्रपटानं अव्वल श्रेणीतल्या नायिकांमध्ये कायमचं स्थान दिलं.
‘डीडीएलजे’ प्रदर्शित झाला १९९५ मध्ये... म्हणजे मागच्या शतकात! हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या फक्त दोन महिने आधीच भारतात पहिला मोबाइल कॉल केला गेला होता. एका मोठ्या क्रांतीची ती सुरुवात होती. त्या अर्थानं ‘डीडीएलजे’ हा मोबाइलपूर्व काळातला शेवटचा मोठा सुपरडुपर हिट चित्रपट. चित्रपटाचं निम्मं कथानक परदेशात घडत असलं, तरी त्यात मोबाइल नाही. भारतानं आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारून अवघी चारच वर्षं झाली होती. मधल्या दोन वर्षांत देशात जातीय दंगली, बॉम्बस्फोट आदी घटनांनी वातावरण पूर्ण बिघडलं होतं. अशा वेळी मोठ्या रुपेरी पडद्यावरचं मनोरंजन हा इथल्या सर्वसामान्य माणसांसाठी एक महत्त्वाचा भाग होता. यशराज फिल्म्स म्हणजे वर्षानुवर्षं लोकप्रिय चित्रपट देणारी फॅक्टरीच झाली होती. या वेळी यश चोप्रांचा मुलगा आदित्य दिग्दर्शनात उतरला होता. त्याची ही पहिलीच फिल्म असणार होती. आदित्यच्या डोक्यात या चित्रपटाचा प्लॉट पक्का होता. परदेशात राहूनही ‘भारतीय संस्कार’ जपणारं पंजाबी कुटुंब आणि ‘बॉय मीट्स गर्ल’ फॉर्म्युला! शाहरुख वगळता चित्रपटाचं सगळं कास्टिंगही तयार होतं. शाहरुखची बहीण त्याच काळात खूप आजारी होती. त्यामुळं शाहरुख वेगळ्या मन:स्थितीत होता. सुरुवातीला तर त्यानं राजचा रोल खूप ‘गर्लिश’ आहे, म्हणून नाकारलाच होता. अखेर त्यानं ही भूमिका स्वीकारली आणि ‘डीडीएलजे’ नावाच्या इतिहासाला सुरुवात झाली...
आज २५ वर्षांनंतर हा चित्रपट पाहिला तर काही ठिकाणी हसू येतं. अमरीश पुरीचा ‘भारतीय संस्कारां’चा आग्रह आणि त्यावर त्याच्या मुलींची व अगदी आईचीही प्रतिक्रिया बघण्यासारखी आहे. याउलट मुलाचं अपयश सेलिब्रेट करणारा अनुपम खेरचा बाप हा जास्त ‘आज’चा (तेव्हा काळाच्या पुढचा) वाटतो. चित्रपटाची लांबी तब्बल तीन तास १० मिनिटांची! तीही तेव्हाच्या सिंगल स्क्रीनला साजेशीच. पहिला चित्रपट तयार करताना आदित्यनं कोणतीही कसूर बाकी ठेवली नव्हती. परदेशांतली लोकेशन्स, उत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट कलाकार, सुपरहिट संगीत आणि विनोदापासून ते मारामारीपर्यंत सर्व मसाल्याचं योग्य मिश्रण... सगळी भेळ उत्कृष्टपणे जमून आली होती. हा चित्रपट वेगवेगळ्या अर्थांनी ‘माइलस्टोन’ ठरला. मात्र, माझ्या मते तो एवढा हिट होण्याचं कारण म्हणजे विसाव्या शतकातल्या शेवटचा दशकात आलेला हा चित्रपट दोन्ही पिढ्यांना धरून ठेवणारा कदाचित शेवटचाच चित्रपट होता. एका अर्थानं यश चोप्रांच्याही पिढीला आवडेल आणि आदित्यच्याही पिढीला आवडेल असा हा शेवटचाच ब्लॉकबस्टर! त्यानंतरही फॅमिली ड्रामा आणि प्रेमकथा आल्याच; पण एवढं उत्तुंग यश कुठलाही दुसरा सिनेमा मिळवू शकला नाही. पुढच्या पाच वर्षांत आपण एकविसाव्या शतकात प्रवेश करणार होतो. जग बदलणार होतं, सिनेमाही बदलणार होताच! ‘डीडीएलजे’ त्याआधीच्या काळातला सिनेमा होता. आपल्याला जुन्या काळाशी जोडून घेणारा एक धागा सदैव हवाच असतो. ‘डीडीएलजे’नं माझ्या पिढीला कायमस्वरूपी हा धागा पुरवला. एकाच वेळी परदेशांतलं लोकेशन, तिथली धमाल आणि सोबत ‘कधीही हात न सोडणारे’ भारतीय संस्कार हा ‘कॉम्बो पॅक’ अफलातूनच होता. नायिकेला ‘जरासा झूम लू मैं’ म्हणत परदेशांतल्या रस्त्यांवर बागडण्याचं स्वातंत्र्यही होतं... आणि ‘परक्या पुरुषा’सोबत रात्री नकळत ‘तसलं’ काही तर घडलं नाहीय ना, या विचारानं रडण्याचा ‘संस्कारी’ हक्कही अबाधित होता. भारतीय मानसिकतेला काय आवडतं, काय झेपतं, याचा अचूक अंदाज आदित्य चोप्राला होता. मुख्य प्रवाहातल्या सिनेमाला झेपेल एवढीच ‘बंडखोरी’ करायची हे तर यशाचं आदिसूत्र! या चित्रपटातही सिमरनला तिची आई सांगते - बेटा, सपने मत देखो ऐसा कौन कहता है? बस, उनके पूरे होने की शर्त मत रखो! आता हे फारच थोर तत्त्वज्ञान झालं. आज २५ वर्षांनी त्याकडं बघताना गंमत वाटते, पण १९९५ मध्ये ते किती अचूक होतं, हे या चित्रपटाच्या अफाट यशानं सिद्ध केलंच. 
एका व्यापक अर्थानं बघायचं तर ‘डीडीएलजे’ हे एक भव्य आणि हवंहवंसं वाटणारं स्वप्न होतं. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या भारतीय तरुणाईला मोहवून टाकणारं स्वप्न! आई-वडील, पालक यांच्या मनाविरुद्ध, त्यांना दुखवून नव्हे, तर त्यांचं मन जिंकून आयुष्यातली उद्दिष्टं, ध्येयं साध्य करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या माझ्या पिढीला ‘राज’ आवडला नसता तरच नवल! एकविसाव्या शतकात भारतीय तरुणाईकडं वेगवेगळ्या कारणांनी जग जिंकण्याचा आत्मविश्वास आला आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षांना सगुण साकार रूप मिळण्यासाठी बहुतांश वेळेला ‘बंडखोरी’ आवश्यक ठरली. एकविसावं शतक सुरू होताना झळकलेला फरहान अख्तरचा ‘दिल चाहता है’ हा चित्रपट याचं प्रमाण होता. या तरुणाईला आता ‘आपल्या टर्मवर’ जगायचं होतं. पालक आणि त्यांच्यातले संबंध दुभंग तरी होते किंवा भावशून्य तरी! पाचच वर्षात एका शतकाचा फरक पडायचा होता, तो हा असा! या पार्श्वभूमीवर ‘डीडीएलजे’नं भारतीय मानसिकतेला सदैव कुरवाळायला आवडत असलेला ‘लाडाकोडा’चा, ‘संस्कारा’चा, ‘फील गुड’चा भाव पुरवला. भारतीय समाजमनाला हवी असणारी, आवडणारी ही ‘हेही हवं आणि तेही हवं’वाली स्वप्नाळू (आणि काहीशी चतुर) मेजवानी आदित्य चोप्रानं अगदी नीट पुरवली. ही पंजाबी डिश सगळ्यांना आवडण्यासारखीच होती. ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ असं सगळं काही होतं त्यात! ‘जा, सिमरन, जी ले अपनी जिंदगी’ म्हणणारा कर्तव्यकठोर, पण प्रेमळ बाप होता, ‘हे हे हे सेन्योरिटा’ करत फ्लर्ट करणारा आगाऊ; पण तरीही हवाहवासा वाटणारा हिरो होता, ‘बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं’ असंही म्हणणारा हिरो होता, ‘अपने देस की मिट्टी’ होती, ‘सरसों का साग और मकई दी रोटी’ होती... टिपिकल पंजाबी लग्न होतं, तिथल्या ‘सोणी कुड्या’ होत्या, प्रेमळ आज्जी होती... काय नव्हतं ते विचारा! 
 मुंबईत ‘मराठा मंदिर’ला मॅटिनीला वर्षानुवर्षं ‘डीडीएलजे’ सुरू राहिला... सध्या ‘करोना’नं त्याला खीळ बसली असली, तरी पुन्हा सगळं सुरळीत झाल्यावर ‘डीडीएलजे’ पुन्हा पहिल्याच दिमाखात सुरू राहील. ‘मेरे ख्याबों में जो आए...’ म्हणत लतादीदींचा तो चिरतरुण सूर कानी पडत राहील... ‘जरा सा झूम लूँ मैं...’ म्हणत आशाबाईंचा अवखळ सूर मनाला आनंद देत राहील... ‘तुझे देखा तो ये जाना सनम...’ म्हणत मोहरीच्या शेतावरून विहरत, लहरत येणारा कुमार सानूचा तो सानुनासिक आवाज थिएटर दुमदुमवत राहील... अमरीश पुरींचा दमदार आवाज अस्सल ‘पंजाबी माती’चा सुगंध घेऊन येईल... हिमानी शिवपुरी, सतीश शहाच्या गमतीजमती आठवत राहतील... मंदिरा बेदी, करण जोहर यांचं रूपेरी पडद्यावरचं हे पदार्पण केवढं अविस्मरणीय ठरलं हे आठवून त्यांनाही आश्चर्य वाटत राहील... शेवटी ‘डीडीएलजे’ हे आपल्या सगळ्या भारतीयांचं रुपेरी स्वप्न आहे.... जोवर भारतीय सिनेमा आहे आणि इथला शेवटचा प्रेक्षक आहे तोवर ‘डीडीएलजे’ नावाचं हे स्वप्नही आपल्या डोळ्यांत राहीलच!

(‘महाराष्ट्र टाइम्स’च्या संवाद पुरवणीत १८ ऑक्टोबर २०२० रोजी प्रसिद्ध झालेल्या संपादित लेखाचा मूळ तर्जुमा)

-----

9 Oct 2020

वॉकिंग अनुभव - लेख

चालायची गोष्ट
-----------------

दहा-बारा दिवसांपूर्वी ऑफिसमधे ‘११ दिवसांत ५० किलोमीटर चालायचं’ असा ‘बूट’ निघाला. उत्साही मंडळींनी लगेच व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला. रीतसर ‘गुगल फिट’ ॲप डाउनलोड केलं आणि दुसऱ्याच दिवसापासून, म्हणजे ३० सप्टेंबरपासून चालायला सुरुवात करायची, असं ठरवण्यात आलं. एकूण ११ दिवस होते. मी स्वत:साठी रोज पाच किलोमीटर चालायचं, असं बंधन घालून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठून, आवरून आमच्या इथे खाली असलेल्या जॉगिंग / वॉकिंग ट्रॅकवर दाखल झालो. मी नांदेड सिटीत राहायला आल्यापासून इथं गेली चार वर्षं सातत्यानं चालतोय. पावसाळ्यात अपवाद होतो. पण तरीही वर्षातले किमान २५० दिवस तरी मी चालत असेन. यंदा मात्र करोनामुळं सर्व जगणंच विस्कळित झालं. तरी जूनमध्ये वॉकिंगला परवानगी मिळाल्यानंतर मी चालायला सुरुवात केली होती. मात्र, पुन्हा पावसामुळं त्यात खंड पडला. मी एक ऑक्टोबरपासून तसाही चालायला सुरुवात करणार होतोच; पण ऑफिसमधल्या या चॅलेंजमुळं मला जरा अधिक उत्साह आला, यात शंका नाही. माझ्याकडं गेल्या वर्षी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेले शूज होते, पण त्यातलं स्पंज जरा निघालं होतं आणि तिथं टोचायला लागलं. मग सरळ सँडल घालून चालायचं ठरवलं. मी रात्रपाळी करून रात्री एक-दीडला झोपत असल्यामुळं अगदी सकाळी उठून चालायला मला जमत नाही. मग ‘जब जागो तब सवेरा’ या न्यायाने मी उठल्यानंतर आवरून, पेपर वाचून वगैरे नऊ किंवा साडेनऊ वाजता चालायला जातो. पूर्वी एफएमवर गाणी ऐकत चालायचो. पण परवा लता मंगेशकरांच्या गाण्यांची एक लिस्ट सापडली. मग रोज तीच गाणी ऐकत चॅलेंज पूर्ण केलं. आमच्या खाली क्लब हाउस आहे आणि भोवती छान झाडी आणि सभोवती आयताकृती ट्रॅक आहे. त्यावर पेव्हर ब्लॉक बसवले आहेत. बाहेरच्या बाजूनं झाडांचं कुंपण आहे. आतील बाजूनंही लॉन आहे. उत्तम निगा राखली जाते. सकाळी अनेक उत्साही लोक इथं फिरत असतात. मात्र, मी खाली येतो तेव्हा ही संख्या कमी झालेली असते. मला मग हा ट्रॅक जवळपास मोकळा मिळतो. दोन्ही बाजूंनी इमारती असल्यानं ट्रॅकवर दहा वाजताही सावली असते. साडेदहानंतर हळूहळू ऊन या ट्रॅकवर यायला लागतं. तोवर चालणं संपवायचं... नंतर क्लब हाउससमोर झाडीत दगडी बाक टाकले आहेत, तिथं विश्रांती घ्यायची. गार हवा खायची आणि वर यायचं असा हा क्रम!
डेडलाइन घेऊन मी पहिल्यांदाच चालत होतो. मला आमच्या इथल्या ट्रॅकची लांबी-रुंदी माहिती होती. मी साधारण २०० मीटरचा एक लूप घेतला. संपूर्ण ट्रॅकवर फिरण्याऐवजी एल आकारात एकाच बाजूनं मी फिरत होतो. या लूपच्या पाच फेऱ्या झाल्या, की एक किलोमीटर होतो. सुरुवातीला मी अतिउत्साहानं थोड्या थोड्या वेळानं ॲपमधल्या घड्याळाकडं नजर टाकून किती मिनिटांत किती अंतर झालं हे बघायचो. मग लक्षात आलं, की असं केल्यानं आपोआप आपल्या चालण्यात एक अडथळा येतो. हा अडथळा त्या ॲपमध्ये पॉझसारखा नोंदवला जातो आणि एकूण चालण्याचा वेग कमी होऊन वेळ वाढतो. मग मी असा निश्चय केला, की एक गाणं पूर्ण ऐकून झाल्यावरच ॲपमध्ये डोकवायचं. ही युक्ती चांगली लागू पडली. एक तर गाणं नीट लक्ष केंद्रित करून ऐकता यायला लागलं आणि दुसरीकडं सतत ॲपमध्ये डोकवायची सवय सुटली. लता मंगेशकरांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या ग्रुपमधून आलेली गाणी माझ्या लिस्टमध्ये होती. ‘नैना बरसे रिमझिम रिमझिम’पासून ते ‘कशी काळनागिणी सखे गं वैरीण झाली नदी’पर्यंत साधारण आठ ते दहा गाणी व्हायची. मला पाच किलोमीटर अंतर चालायला साधारण ४० ते ४५ मिनिटं लागली. (हा वेग खूप चांगला आहे, असं मला नंतर सहकाऱ्यांकडून कळलं.) खरं तर मी मुद्दाम, जीव तोडून वेगानं चालत नव्हतोच. पण अगदी बागेत चालल्यासारखंही चालत नव्हतो. ‘ब्रिस्क वॉक’ मला माहिती होता. तसंच मी चालत होतो. शिवाय पाच वर्षं चालण्याची सवय होती. ती अधूनमधून खंडित झाली असली तरी मुळात शरीराला सवय होती. अगदी पूर्वी म्हणजे वयाच्या १३ व्या वर्षापासून ते २४ व्या वर्षापर्यंत खूपच खूप सायकलिंग केलं होतं. त्यामुळं माझे पाय तसे बऱ्यापैकी मजबूत आणि चालायला सक्षम आहेत. त्यामुळं आपण सरासरी नऊ मिनिटांत एक किलोमीटर चाललो, याचं फार आश्चर्य वाटलं नाही. नंतर मात्र, हे अंतर रोज तेवढ्याच वेळात पूर्ण होतंय ना, हे पाहायची खोड लागली. अर्थात एखादा अपवाद वगळता कधीही ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला नाही. चालताना सतत ॲपमध्ये बघायचं नसल्यामुळं मी गाण्यांवर अंतराचे ठोकताळे बांधू लागलो. ‘सोलह बरस की बाली उमर को सलाम’ किंवा ‘सावर रे सावर रे’ ही गाणी एवढी मोठी आहेत, की ती ऐकता ऐकता जवळपास एक किलोमीटर अंतर कापलं जायचं. ते गाणं संपल्यानंतर ॲपमध्ये डोकावलं, की अंतर एकदम वाढलेलं दिसायचं. नंतर नंतर मला गाण्यांचा क्रम आणि कुठलं गाणं संपल्यावर साधारण किती अंतर कापलं गेलं असेल याचाही अंदाज यायला लागला. तो बहुतेकदा बरोबर यायचा. ब्रिस्क वॉक केल्यानं अंगातून घाम पाझरायला सुरुवात व्हायची. टी-शर्ट वरून खाली असा ओला होत जायचा. घामाची रेषा शर्टवर कुठं आल्यावर किती किलोमीटर झाले असतील, याचाही अंदाज बांधायला मी सुरुवात केली. तोही बरोबर यायला लागला. साधारणत: पहिले दोन किलोमीटर अंतर झाल्यावर घाम यायला सुरुवात व्हायची. आधी कपाळावरून भिवयांवर सतत पाणी येत राहतं. मग ते झटकत झटकत चालायचं. नंतर टी-शर्ट ओला व्हायला सुरुवात व्हायची. सुरुवातीला नऊ मिनिटांत एक किलोमीटर पूर्ण झाला नाही, तर मला थोडं वाईट वाटायचं. मग दुसऱ्या लूपला मी वेग काहीसा वाढवायचो. स्वत:समोर काल्पनिक टास्क ठेवायचो. उदा. हे शेवटचे २०० मीटर मी आता दीड मिनिटांत कापले तर नीलला ‘नासा’वाले त्यांच्या टीममध्ये प्रवेश देणार आहेत किंवा मी आज शेवटचा लूप साडेआठ मिनिटांच्या आत पूर्ण केला तर ब्रिटनची राणी मला राजेपद बहाल करणार आहे वगैरे. 

गाण्यांची मजा असते. मी ही ठरावीक गाणी रोज ऐकल्यानं मला त्यातले चढ-उतार, कडवी, म्युझिक पीसेस, खटके-मुरके अगदी पाठ झाले. वास्तविक ही गाणी मी यापूर्वीही अनेकदा ऐकली आहेत. पण आत्ता चालताना ऐकताना विशेष आनंद मिळाला. ‘सोलह बरस की बाली उमर को सलाम’ हे गाणं ऐकताना मी थेट पाच किंवा सहा वर्षांचा होऊन जायचो. जामखेडला आमच्या गावी टुरिंग टॉकीज होती. तिथं सिनेमा सुरू व्हायच्या आधी गाणी लावायचे. माझ्या लहानपणच्या आठवणी १९८१ पासून सुरू होतात. हे गाणं ऐकलं, की मी जामखेडमध्ये पोचतो. माझ्या घरात मी आहे आणि दूरवरून लाउडस्पीकरवरून हे (किंवा ‘एक दुजे के लिए’मधली इतर गाणी) गाणं लागलं आहे, हेच दृश्य डोळ्यांसमोर तरळतं. क्वचित कधी तरी टॉकीजमध्ये जाऊन हे गाणं ऐकलं, की मग तर तेच सूर कानात राहायचे. अनुप जलोटानं गायलेल्या त्या सुरुवातीच्या दोन ओळी आणि नंतर दीदींची जबरस्त तान... अंगावर काटाच येतो. दर वेळी येतो. सोबत लहानपणात घेऊन जाणारा तो स्वरमेळ! हीच गोष्ट ‘बरसात’च्या गाण्यांची. आमच्याकडं ‘बरसात’ आणि ‘श्री ४२०’ची कॅसेट होती. ती मी आमच्या टेपरेकॉर्डरवर लावून सतत ऐकत असे. शक्यतो वरचं कव्हर उघडं ठेवून कॅसेट आत घालायची आणि दोन्ही हात हनुवटीवर ठेवून त्या इकडून तिकडं फिरत जाणाऱ्या तपकिरी टेपकडं आणि मागच्या स्पीकरमधून येणाऱ्या आवाजाकडं एकटक पाहत राहायचं हा माझा छंद होता. ‘हवा में उडता जाए मोरा लाल दुपट्टा मलमल का’ आणि ‘जिया बेकरार है’ ही दोन गाणी आत्ताच्या माझ्या प्ले-लिस्टमध्ये आली आणि काय सांगू! पुन्हा एकदा लहानपणच जागं झालं. चालताना ही गाणं ऐकणं म्हणजे पर्वणीच होती. माझं शरीर आपोआप हलकं हलकं होत जात असे आणि चालण्याचा वेग त्या गाण्याची लय पकडत असे. या सूरांना आपलं शरीर असाच प्रतिसाद देत असतं. ‘सोलह बरस की...’मधली ती अशक्य तान ऐकून अंगावर काटा यायचा आणि पोटात उचंबळून यायचं. ‘हवा में उडता जाए’मधल्या ‘फरफर फरफर उडे चुनरियाँ’ ऐकताना पावलं आपोआप वेगात पडायची. ‘घुंगरू बाजे छुन्नुक छुन्नुक चाल हुई मस्तानी’ ऐकताना मागं वाजणारे घुंगरू ऐकून चालता चालता आपण हवेत उडतोय की काय, असं वाटायला लागायचं. ‘जाने क्या बात है...’मध्ये दीदी ‘बडी लंबी रात है’ हे वाक्य होता होईल तेवढं लांबवून म्हणतात. तेव्हा आपोआप पावलांची गती मंद व्हायची. ‘सावर रे सावर रे’ ऐकताना ‘उंच उंच झुला’च्या वेगासोबत आपलाही वेग वाढायचा. अशा या सगळ्या गमती-जमतींमुळं चालणं आनंददायी झालं.
मी चालताना अगदी अधोमुख होऊन चालतो. याचं कारण आमच्या इथं ट्रॅकवर बरेच जीवजंतू विहरत असतात. बारीक मुंग्या, मुंगळे, इतर काही कीटक असतात. यांच्यावर चुकूनही पाय पडू नये याची दक्षता मी घेत असतो. त्यासाठी सदैव खाली बघून चालावं लागतं. कधी कधी मानेला किंचित रग लागते, पण मी हे कटाक्षानं पाळतोच. कधी तरी कुणी कुत्र्यांना खेळायला तिथं लॉनवर घेऊन येतात. लांबून त्यांना बघितलं, की माझी दिशा बदललीच म्हणून समजा. क्वचित भटकी कुत्रीही येऊन बसतात. पण मी त्यांना घाबरत नाही. वळसा घालून जातो. मात्र, ही पाळीव, आडदांड कुत्री लॉनवर मोकळी सुटली, की मला धडकीच भरते.
चालून झालं, की ॲपवरचे आकडे आणि तिथल्या गमतीशीर प्रतिक्रिया वाचायला मजा येते. नाइस वर्क, श्रीपाद किंवा अनस्टॉपेबल, यू डिझर्व्ह ए ब्रेक वगैरे वाचून हसायचं, स्क्रीनशॉट काढायचा आणि ग्रुपवर टाकून द्यायचा. मग गार सावलीत पाच मिनिटं बसायचं...
अशी ही माझी चालण्याची गोष्ट... ही वाचून तुम्हालाही चालायला प्रेरणा मिळाली तर आनंदच आहे. ‘चालायचंच’ म्हणून सोडून देऊ नका फक्त!

---