28 Jul 2021

फिरकीचा ठोंब्या - भाग ६

साहित्यिक सर्जिकल अट्याक...
--------------------------------------

साहित्याशी आपली जन्माची गाठ बांधली गेली आहे, याची खूणगाठ आम्ही बालवयातच बांधून ठेवली आहे. लहानपणी फटाक्यांच्या खोक्यापेक्षा आम्हाला दिवाळी अंकांतल्या चौकटी आणि खिडक्या आवडू लागल्या होत्या, तेव्हाच घरच्यांनीही 'ठोंब्याचे अवलक्षण' ओळखले होते. कालांतराने आम्ही वयात इ. आल्यानंतर फटाक्यांतल्या लवंगी आणि ॲटमबॉम्बपेक्षा दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठावर झळकणाऱ्या 'लवंगी' आणि 'आयटेमबॉम्ब'मधली आमची रुची जगजाहीर झाली होती. दिवाळी अंकांचे आणि आमचे असे प्रेम जडले ते तेव्हापासून... मग काही चोरट्या-किरट्या आठवणी... अर्थात् काही अंक चोरून वाचण्यात जी मजा असायची ती आता खुलेपणाने गोष्टी करूनही नाही मिळत! तर ते असो. दिवाळी अंकांच्या वाचनातील 'मौज' पूर्वीच ओळखल्यामुळं आम्ही पुढं लेखकू होणार, यात 'नवल' नव्हते. आपणच साहित्यसृष्टीतले 'हंस', असा एक आमचा समज होता. पण भल्याभल्यांनी 'आवाज' टाकल्यानं आमच्या भवितव्याचं 'अक्षर' स्पष्टच दिसून आलं होतं. त्या वाटेवर अनेक 'मेनका', 'मोहिनी' असल्या, तरी फुकाची 'चपराक' खायला लागेल, म्हणून आम्हीच आमचं साहित्यविषयक ज्ञान गुंडाळून ठेवलं होतं. कितीही 'साधना' केली, अगदी 'सत्याग्रही' झालो, तरी साहित्य क्षेत्रातील यशाचे 'ऋतुरंग' दिसतीलच, याची शाश्वती नव्हती. इथं शेवटी लोकांची इच्छा, 'लोकसत्ता' महत्त्वाची; उगाच 'लोकमत' आपल्या मागे आहे, असा खोटा समज करून समाधानाचा 'दीपोत्सव' साजरा करण्यात काहीच मतलब नव्हता. 'कालनिर्णय' अगदी स्पष्ट होता. आमचं लेखक म्हणून भवितव्य अगदी धूसर दिसू लागलं होतं. 'ग्रहांकित' मंडळींनीही पाठ फिरविली होती. आता फार ताणण्यात अर्थ नव्हता...
शेवटी आम्ही निर्णय घेतला. साहित्यिक सर्जिकल अट्याक करायचा... काट्यानं काटा काढायचा. लेखक म्हणून यशस्वी व्हायचं असेल, तर आधी दिवाळी अंकांतच लेख लिहून प्रसिद्ध व्हायचं. मग आपोआपच लोक आपल्याला मोठा लेखक म्हणू लागतील. आम्ही 'फास्टर फेणे' नसतानाही आनंदानं 'ट्टॉक' केलं. काही लोकप्रिय लेखकांचा अदमास घेतला. काही ठरावीक अंकांत तेच तेच लेखक वर्षानुवर्षं एकाच साच्यातून लेखरूपी पीठ पाडत होते, असं लक्षात आलं. हे अंक फार नामवंत होते, प्रख्यात होते. तिथं आमच्यासारख्यांना प्रवेश मिळणं अशक्यच होतं. 'साभार परत'चं सौजन्यही हल्ली कुणी दाखवत नाही, हे गुपित आमच्या एका कविमित्रानं आमच्याबरोबर एका 'कवि'स्थळी रात्रीच्या उत्तरकाळात, जमिनीपासून अदमासे दहा हजार फुटांवरून त्याचं फ्लाइट उडत असताना शेअरलं होतं. तेव्हा आम्ही त्या नामवंत अंकांचा नाद सोडला. 'कोल्ह्याला द्राक्षे आंबट' असं त्या नतद्रष्ट मित्रानं आम्हाला तिथल्या तिथं ऐकवल्यावर त्याचं बिल न भरण्याचा बाणेदारपणा दाखवून आम्ही कोल्ह्याइतकाच धूर्तपणा दाखवून डाव साधला होता. तर ते असो.
एकाच वेळी पन्नास दिवाळी अंकांत लेख लिहायचा महासंकल्प आम्ही ऐन एप्रिलच्या उकाड्यात, एका संकष्टीचा उपास सोडताना, म्हैसूरपाकाचा तुकडा मोडताना मनातल्या मनात सोडून टाकला. दिवाळीला अजून सहा महिने होते. एका महिन्यात आठ ते नऊ लेख पाडावे लागणार होते. आमच्या बेनसन-जानसन टाइप कंपनीत अगदी सरकारी नोकरीएवढा नव्हता, तरी पुष्कळच आराम होता. त्यामुळं त्या आघाडीवरून काही धोका नव्हता. रोजच्या रोज तिथं हजेरी लावणं एवढाच काय तो कटकटीचा भाग होता; पण तेवढा नाइलाज होता. तर या दिवाळी अंक लेख मोहिमेत आम्हास आमच्या परममित्राची फार मदत झाली. (हा कवी नव्हे. हा एलआयशीवाला...) त्यानं त्याच्या लायब्ररीतून गेल्या वर्षीच्या पन्नासेक दिवाळी अंकांचा गठ्ठा आमच्यासमोर आणून आदळला. या बदल्यात त्याला एकदा तीर्थप्राशनास न्यावयाचे, हे परवडण्याजोगे होते. (बाकी हा मित्र त्या आमिषापायी हिमालयसुद्धा उचलून आणू शकतो. वर 'बर्फाची कायमची सोय झाली,' हेही ऐकवायला कमी करणार नाही. तर ते असोच.) तर ते अंक बघून आमचे डोळे लकाकू लागले. विशेषतः ज्योतिषविषयक, पाककृतीविषयक आणि सिनेमाविषयक विशेषांक बघून तर हर्षवायू व्हायला बाकी राहिला. आम्ही तसे हातखंडा लेखक आहोत. सांगाल त्या विषयावर आणि सांगाल तितक्या शब्दांत लेख लिहून देणं हा आमच्या डाव्या हातच्या बोटांचा खेळ आहे. (पूर्वी डाव्या हातचा मळ म्हणत असत; पण आता कळफलक असल्यानं डाव्या हातची 'कळ' म्हणायचा पाहिजे खरं तर... तर पुन्हा असो.) त्यामुळं या अशा विशेषांकात आपण सहज पंधरा-वीस लेख उडवू, असं एक विलक्षण स्फुरण आम्हास चढलं. आमचे बाहू अचानक फुरफुरू लागले. समोरचं कुरकुऱ्यांचं पाकीट फोडून आम्ही संगणकावर 'एंटर' मारला आणि आमचा साहित्ययाग सुरू जाहला...
बसल्या बैठकीला आम्ही एक पाककृतीविषयक लेख लिहून काढला. पाककृतीविषयक लेख लिहायला आपल्याला स्वतःला स्वयंपाक करता यावा लागतो, हा अज्ञ लोकांचा भ्रम आहे. आमच्यासारखे साहित्यिक असे भ्रम बाळगू लागले, तर लिहावे कसे? हे म्हणजे नदीवर लेख लिहायचा असेल, तर पोहायला येणे आवश्यक आहे, असे म्हणण्यासारखेच वेडपटपणाचे होय. हल्ली भटकंतीला गेलं, की कुठं ना कुठं तरी एक लोकप्रिय खाद्यपदार्थांचा स्पॉट असतोच असतो. आमच्या पायाला अगदी भिंगरी लागलेली नसली, तरी आम्हीही बऱ्यापैकी फिरतो. तेव्हा चार खादाडीची ठिकाणं ठाऊक आहेत. तेथील अनुभवांची जंत्री गोळा केली, तर सुमारे सोळा ठिकाणं निघाली. मग एका लेखात चार ठिकाणं घालून चार लेख तयार केले आणि चार दिवाळी अंकांच्या मेल आयडीवर टिच्चून सेंड करून टाकले. चार लेख तयार करताना एक टेम्प्लेटच तयार करून घेतलं. असले लेख लिहिताना रिपोर्ताज पद्धती उपयोगाला पडते. त्या खाद्याच्या स्पॉटवर पोचेपर्यंतचं प्रवासवर्णन करीत राहायचं. तिथंच निम्मा लेख भरतो. उदा. 'कार्तिकाचे दिवस. थंडी मी म्हणत होती. भल्या पहाटे बाइक काढून तीन मित्र निघालो. पुण्यातून बाहेर पडताना वेळ कमी लागला, पण झोंबता वारा अंगाशी खेळू लागल्यानं जठराग्नी भडकला. उत्तर दिशेला निघालेला हा हायवे आपल्याला सह्याद्रीच्या कुशीची सैर घडवतो. डाव्या बाजूला भगीरथगडाचे सुळके दिसू लागले होते. सोनटाक्यांचं पाणी दूरूनही लकाकताना दिसत होतं. त्याच वेळी भय्याच्या मिसळीच्या आठवणीनं तोंडाला पाणी सुटत होतं...' अशी एक प्रस्तावना लिहून टाकायची. दुसऱ्या लेखाच्या वेळी कार्तिकाच्या जागी अश्विन, बाइकच्या जागी कार, तीनच्या जागी दोन मित्र, उत्तरेच्या ऐवजी दक्षिणेचा हायवे, 'डाव्या'ऐवजी उजव्या, भगीरथगडाऐवजी भरतगड, भय्याच्या जागी अप्पा आणि मिसळीच्या जागी कांदाभजी टाकून द्यायची... हाय काय अन् नाय काय!
थोडक्यात काय, साहित्यिक सर्जिकल अट्याक करायचा, हे नुस्तं 'खळ्ळं खट्याक' करण्याइतकं सोपं काम नाही. त्याला फार दांडगा उत्साह, अफाट पूर्वतयारी आणि कॉपीचा (म्हणजे मजकुराचा) अचाट सराव लागतो. रात्री-बेरात्री मजकूर टंकताना कॉफी ढोसून रात्री काढण्याचाही सराव आवश्यक असतो. बसल्या बैठकीला चार ते पाच मध्यम आकाराचे लेख उडवण्याचा आम्हाला आता अगदी सराव झाला आहे. पाककृतीविषयक दिवाळी अंकांचा अभ्यास केला असता, असे लक्षात आले, की या अंकांमध्ये येणाऱ्या मजकुराचाही एक साचा झाला आहे. उकडीच्या मोदकाप्रमाणे या साच्यातूनही अनेक लेख बाहेर काढता येतात. अगदी वर दिलेल्या नमुन्यासारखे! पाककृतीविषयीचे आमचे लेख फारच चविष्ट झाले आहेत, असं आमचं मत झालं. नमुन्यादाखल एक लेख कुटुंबाला वाचायला दिला असता, झरझर नजर फिरवून तिनं तो आमच्याकडं पुन्हा भिरकावला. 'हा लेख गेल्या वर्षीच वाचलाय,' या तिच्या टिप्पणीनं तर आम्हाला उकळत्या काहिलीत फेकल्यासारखं झालं. यापुढं आपलं दिवाळी अंकाचं साहित्य हे गोपनीय ठेवायचं आणि अंकात छापल्यानंतरच ते लोकांना वाचायला द्यायचं ही खूणगाठ मनात बांधून ठेवली. (अंकात छापून आल्यानंतरही काही लेख अंकासकट गोपनीय राहतात, हा भाग वेगळा!) आपल्या साहित्यसेवेची आणि लेखांची कदर आज ना उद्या कुटुंबाला, मग आमच्या सोसायटीला, मग समाजाला आणि मग समस्त देशाला होईल, या आशेवर आम्ही तगून आहोत. आशा बाकी भारी चिवट!
पाककृतीवरच्या लेखांचा फडशा पाडल्यानंतर आम्ही ज्योतिषविषयक लेखनाकडं वळलो. वास्तविक आम्हाला आमचा भूतकाळ फारसा लक्षात राहत नाही, वर्तमानाविषयी तर आम्ही कायमच दुग्ध्यात पडलेलो असतो, तर भविष्याविषयी काय सांगणार वा लिहिणार, डोंबलं! पण दिवाळी अंक साहित्ययाग सुरू झालेला असल्यानं त्यात केवळ आमच्या प्रतिभेचीच नव्हे, तर अशा तर्कदुष्ट, विवेकी इ. प्रश्नांचीही समिधा पडत होती, हे आमच्या लक्षात आलं. मग फार विचार न करता, आम्ही ज्योतिषविषयक लेखन करायला सुरुवात केली. वास्तविक, पेपरांत उपसंपादकी करीत असताना रोजचं बारा राशींचं भवितव्य ठरवण्याचा अनुभव पाठीशी होता. मात्र, आम्ही थेट ज्योतिषाविषयी लेखच लिहू, हा होरा काही कुणीही वर्तवलेला नव्हता, हे खरं. आम्ही 'चालू' वर्तमानकाळ या कॅटॅगरीतले इसम असल्यानं (फक्त 'चालू'ला अवतरण टाकलंय का? ते 'वर्तमानकाळ'पर्यंत आहे हो!) लेखन करतानाही कधी भविष्यकालवाचक क्रियापदं हातून लिहिली जात नाहीत. त्यामुळं सुरुवातीला गडबड उडाली. पुढच्या वर्षीचं, अर्थात २०१७ सालचं भविष्य लिहितानाही 'होईल'ऐवजी 'झाले आहे' असंच लिहिलं जाऊ लागलं, तेव्हा आम्ही 'छोटा सा ब्रेक' घेतला. डोळे बंद करून स्वतःचं भविष्य डोळ्यांसमोर आणलं. फार काही आशादायक दिसेना, तसा आणखी त्रास व्हायला लागला. तेव्हा पाककृतीप्रमाणेच बसल्या बैठकीत याही चार-पाच लेखांचा फन्ना उडवायचा, असा वज्र की कायसा म्हणतात, तो निर्धार करून आम्ही कळ दाबली. भविष्यविषयक लेखन करणे फार सोपे आहे, असे आमच्या लक्षात आले. पहिली रास घेतली. आपल्या परिचयातली त्या राशीची व्यक्ती समोर आणली. त्या व्यक्तीचं पुढल्या वर्षात काय व्हायला पाहिजे, याचा एक आराखडा मनातल्या मनात तयार केला आणि सरळ 'एंटर' मारला. पण प्रत्येकाचं भविष्य फारच निगेटिव्ह यायला लागलं. तेव्हा आम्ही चतुर भविष्यवेत्त्याप्रमाणे, पण... परंतु... किंतु आदी शब्दांचा भडीमार करून सर्व ग्रहांना नीट शिस्तीत उभं केलं आणि सगळ्या राशींना खूश करून टाकलं. आमच्या राशीतही आम्हाला सहा महिन्यांनी मोठी धनराशी दिसू लागली. पण आम्ही मराठी दिवाळी अंकांत लिहीत असल्याचं वास्तव लक्षात आल्यानं आमची राशी आम्ही राईची करून टाकली.
बघता बघता आम्ही सात-आठ खादडीचे, तर आठ-दहा ज्योतिषविषयक लेख लिहून हातावेगळे केले. पटापटा मेल करून टाकले. आणखी दहा लेख आम्ही विनोदी ढंगाचे लिहिले होते. (आमच्या त्या नतद्रष्ट मित्राने आमच्या आधीच्या १८-२० लेखांची जिम्माही याच कॅटॅगरीत करून टाकली.) हो, विनोदी लिहिण्याचा आम्हास भारी छंद! रामप्रहरी उठावे आणि दोन्ही हातांच्या बोटांनी स्वअंगास गुदगुल्या करून खुदुखुदू हसत राहावे, हा आमचा प्रातःकालीचा व्यायाम होय. त्यानंतर आम्ही हा हा म्हणता (किंवा करता) दहा-बारा विनोदी लेख हसत हसत बडवतो. आमचे विनोदी लेख वाचताना आम्हासच भारी हसू येत्ये. कित्येकदा तर कम्प्युटरसमोरची खुर्ची ढकलून आम्ही जमिनीवर गडाबडा लोळलो आहोत. या दर्जाचा विनोद सांप्रतकाळी मराठीत मिळणं कठीण; पण त्याची किंमत किती जणांस आहे? तर ते असोच. 
नंतर नंतर तर आम्हाला दिवाळी अंकाचे लेख लिहिण्याचे व्यसनच जडले. कुठली फाइल उघडतो आहोत, किती मजकूर बडवतो आहोत, कुठं एंटर मारतोय, कुठं डिलीट मारतोय, कुठं सेव्ह करतोय... कश्शाकश्शाचे भान उरले नाही. बोटे अखंड कळफलकावर नाचत राहिली. 'नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी...' असं म्हणून नामदेवमहाराज 'नामा'निराळे झाले असले, तरी आम्ही ते ब्रीद सोडलेले नाही. 'नाच की-बोर्डाचे टंकी, अक्षरदीप लावू अंकी' हेच ते आमचे ब्रीद...
तर लेख लिहून झाले. टिच्चुक्कन मेल केले... मेल्या मेलबॉक्सनं चक्क ढेकरही दिला... आता आमची खरी कसोटी सुरू जाहली होती... पन्नासएक अंकांत कुठं काय लिहिलं, हे लक्षात राहिना, म्हणून त्याची एक यादीच खिशात घेऊन फिरू लागलो... आता प्रतीक्षा होती ती आधी संपादकांच्या आणि मग वाचकांच्या प्रतिसादाची...
आणि मंडळी, इथे पूर्वरंग संपलेला आहे... उत्तररंग पुढील अंकी...


----

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, डिसेंबर २०१६)

---

पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा...

---

फिरकीचा ठोंब्या - भाग ५

मेहुणचार
-----------

लेखक म्हणून काही कुठं लवकर बस्तान बसण्याची शक्यता दिसेना, तसे आम्ही अस्वस्थ झालो. आता वेगळ्या मार्गानं प्रसिद्ध व्हावं, असं आम्ही ठरवून टाकलं. आणि एकदा का आम्ही एखादी गोष्ट ठरवली, की ती आम्ही करतोच! मोठमोठ्या लोकांचं अनुकरण करावं, असं वाटू लागलं. मोठ्या लोकांनी अभ्यास केला होता, ग्रंथ वाचले होते आणि बरंच लिहून ठेवलं होतं. यातलं काहीही करायचं तर खूप वेळ गेला असता आणि ती गोष्ट अगदीच त्रासदायक होती. इथं फेसबुकावर पोस्ट केल्यानंतर तासाभरात किमान शंभर लाइक नाही आले, तर ती पोस्ट फेल गेली, असं समजण्याचा काळ हा! तिथं अभ्यास आदी करण्यासाठी ग्रंथ इ. वाचणं हा प्रकार फारच 'ई' होता. हल्लीच्या ई-बुकांच्या जमान्यात असले 'ईई' प्रकार करायला आम्ही काही अगदी 'हे' नव्हतो. आता काय करावे बरे, या विचारात सचिंत की कायसे होऊन आम्ही बसलो होतो. हातात चाळा म्हणून पेपर धरला होता. सहज म्हणून आमचं लक्ष एका बातमीकडं गेलं आणि आम्ही हरखलो. आनंदाच्या झोक्यावर बसून उंच उंच आभाळी गेलो. मग आम्हाला गगन ठेंगणे झाले. नंतर आनंद गगनात मावेनासा झाला आणि आभाळमाया दाटून आली. असे बरेच प्रकार झाल्यावर आम्ही पुनश्च जमिनीवर आलो. त्या बातमीकडं वारंवार पाहू लागलो. अतिआनंदानं डोळे झरू लागले. साक्षात संमेलनाध्यक्ष बोलले होते. कित्ती कित्ती दिवसांनी बोलले होते...
ते बोलत नव्हते, गप्प गप्प होते म्हणून महाराष्ट्राचं साडेतीन पेठांत पसरलेलं सांस्कृतिक विश्व गाढ झोपी गेलं होतं. झोप कसली; काळनिद्राच ती! श्रावणात फुकटचं मेहुण म्हणून, पुरणपोळीचं जेवण हाणून, तुपकट चेहऱ्याचं समाधान चेहऱ्यावर आणून, पंखा चारवर फिरवून गारेगार झोपणं म्हणजे दुसरं काय! काळनिद्राच! या पापाला क्षमा नाही... नाही, नाही! अशा या तुप्पाळ, मध्यमवर्गी सांस्कृतिक पुरुषाला गदागदा धरून, पेकाटात लाथ घालून हलवलं ते संमेलनाध्यक्षांनी... माजी संमेलनाध्यक्षांच्या पाठीत त्यांनी जाता जाता चार रट्टे घातले आणि 'केवळ मेहुण म्हणून मिरवण्यात त्यांनी धन्यता मानली,' अशी सिंहगर्जनाच त्यांनी करून टाकली. हा प्रकार घडल्यानंतर एका माजी संमेलनाध्यक्षांनी हे सगळं प्रकरण स्वतःवर ओढवून घेतलं आणि एक स्पष्टीकरण देऊन टाकलं. मग माजायची ती खळबळ माजलीच आणि माध्यमांत नेहमीप्रमाणं हे प्रकरण गाजवण्यात आलं.
एवढं सगळं झाल्यावर संमेलनाध्यक्षांच्या घरी जाऊन चहा घेणं आलंच. चहासोबत त्यांची एक फर्मास मुलाखतच घेऊन टाकू, असा विचार करून आम्ही कुमठेकर रस्त्याच्या दिशेनं कूच केलं. संमेलनाध्यक्षांच्या घरी जाणं हे कुमठेकर रस्त्यावर वाहन पार्क करण्यापेक्षा कमी धार्ष्ट्याचं आहे, असं आमच्या लक्षात आलं. आम्ही घरात पाऊल टाकताक्षणीच, 'लले, दोन कप चहा टाक' ही चिरपरिचित गर्जना कानी आली आणि आम्हास गुदगुल्या झाल्या. मागं म्हटल्याप्रमाणं एक कप चहावर एक तास व्याख्यान ऐकायची आमची तयारी असते. त्यानंतर मात्र आम्हास दुसरा कप लागतो. चहा होईपर्यंत आम्ही संमेलनाध्यक्षांचा अंदाज घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरून ते आनंदात आहेत की दुःखात, चिडले आहेत की रागावले आहेत याचा काही थांगच लागत नाही. पण चहा घेतल्यावरही ते शांत होते तेव्हा ते आनंदात असावेत, असा निष्कर्ष काढून आम्ही प्रश्नोत्तरास हात घातला. 

ठोंब्या : माजी संमेलनाध्यक्षांत सगळ्यांत चांगलं मेहुण कोण होतं?

संमेलनाध्यक्ष : कवी अनिल आणि कुसुमावती देशपांडे. कारण हे नवरा-बायको दोघंही अध्यक्ष होते आणि त्यामुळं त्यांना डबल मान मिळाला. विश्राम बेडेकर आणि मालतीबाई बेडेकर यांचंही नाव घातलं असतं. पण मालतीबाईंचं समांतर संमेलन होतं. समांतर मेहुणाची पद्धत आपल्यात नाही.

ठोंब्या : संमेलनाध्यक्षांनी मेहुण म्हणून काय काय तयारी करावी?

सं. अ. : त्यांनी लग्न करावं. हो, हे अगदी आवश्यक आहे. त्याशिवाय मेहुण नसतं. बिनलग्नाचे अनेक पार्टनर साहित्यिकांना असतात. ते चालणार नाही. रीतसर लग्नच व्हायला हवं.

ठोंब्या : आणि दोन कप च्या?

सं. अ. : हो, हा महत्त्वाचा निकष आहे. आल्या-गेल्याला आल्याचा चहा देता आला पाहिजे. त्यासाठी आपलं खटलं चहात तरबेज हवं. खरं तर ही प्रथा आम्ही सुरू केली आहे. आमच्या चहापानावर बहिष्कार घालण्याची प्राज्ञा अजून कुणाची झालेली नाही. कारण हिच्या हातचा आल्याचा चहा... 

ठोंब्या : समजा, आलं नसेल तर कुणी काय करावं?

सं. अ. : मराठी साहित्यिकाच्या घरी आलंही नसेल, तर तो गेल्यातच जमा आहे. आलं नसणं हा मराठी सारस्वताचा अपमान आहे. आलं असलंच पाहिजे. आलं नसेल, तर वेलदोडा घाला. पण हे म्हणजे बायको नाही म्हणून सुपारी ठेवून सत्यनारायणाची पूजा करण्यापैकी आहे. सुपारी ही अर्धांगाला पर्याय असू शकत नाही. सुपारीची कामं निराळी; बायकोची निराळी... ती मी निराळ्या व्याख्यानात सांगीन.

ठोंब्या : सांगून टाका ना... तसाही विषय भरटकलाय... एक फरक दिसतोय. सुपारी उचलता येते; बायको...

सं. अ. : गप्प बसा. विषय मी भरकटवलेला नाही. तुम्ही याला जबाबदार आहात. तुम्हीही माजी संमेलनाध्यक्षांसारखेच अगदीच हे दिसता...

ठोंब्या : 'हे' म्हणजे?

सं. अ. : मोठा विषय आहे. व्याकरणदृष्ट्या पाह्यला गेलं तर 'हा' म्हणजे पुल्लिंगी, 'ही' म्हणजे स्त्रीलिंगी आणि...

ठोंब्या : राहू द्या, राहू द्या. 'हे' आपलं इथंच राहू द्या. मी पुढचा प्रश्न विचारतो. संमेलनाध्यक्षानं मेहुण म्हणून प्रत्यक्ष कार्यस्थळी मिरवण्यासाठी काय काय पूर्वतयारी करावी?

सं. अ. : एक तर त्यांनी घरातल्या घरात मिरवण्याची प्रॅक्टिस करावी. संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यापासून सदैव एक पोझिशन घेऊन बसावं. अगदी सकाळच्या त्या महत्त्वाच्या कृत्याच्या वेळीही तुम्ही एक विशिष्ट सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि वैचारिक पोझ घेऊन बसलं पाहिजे. त्या महत्त्वाच्या कृत्याच्या वेळेपासून ते निशासमयीच्या अतिमहत्त्वाच्या कृत्यापर्यंत सदैव तुम्ही ही पोझ घेऊन बसलं पाहिजे. रात्री तुम्ही नैमित्तिक वैषयिक पोझ पण घेऊ शकता. साहित्यिक हा संत नव्हे. या कृत्यापासून त्या कृत्यापर्यंत पोझ घेतली असेल, तरच तुम्हाला कृतकृत्य झाल्यागत वाटेल.

ठोंब्या : एक मिनिट, एक मिनिट... त्या सकाळच्या महत्त्वाच्या कृत्याच्या वेळी सगळी माणसं एकच पोझ घेतात. ही अशी...

(आम्ही सोफ्यावर ती कृती करायला आणि वैनींनी दुसरा कप आणून ठेवायला एकच गाठ पडली. आम्ही सोफ्यावरून कोलमडलो.)

सं. अ. (भिजलेल्या बकरीकडं पाहावं तशा कारुण्यपूर्ण नजरेनं पाहत) : हूं: अशी कुणालाही पोझ घेता येत नसते. हे वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ आणि उन्नत माणसाचं काम आहे.

ठोंब्या : तुम्ही करून दाखवता का मग?

सं. अ. (अतीव संतापानं आणि पाय वर घेत) : मी ऑलरेडी पोझिशन घेतली आहे, घेतली आहे. 

ठोंब्या : बरं, बरं. रागावू नका. अजून काय तयारी करायची पोझ सुटली की?

सं. अ. : येईल ती गावभरातली कार्यक्रमाची आमंत्रणं स्वीकारायची. एखाद्या फुटकळ कवीच्या पुस्तक प्रकाशनापासून (इथं त्यांनी टी-पॉयवर पडलेल्या 'नव्हाळीच्या कविता'ची कॉपी उचलली... हाय रे कर्मा!) ते 'हिप्पेटायटिस- बीवर युनानी उपचार' या विषयावरच्या परिसंवादापर्यंत कोणताही कार्यक्रम सोडायचा नाही. कार्यक्रमाला आलो तर दोघंही येऊ असं सांगायचं. जेवायची आणि नेण्या-आण्याची सोय करायला सांगायची. मानधन मजबूत सांगायचं. कमी मानधन घेणारा पुढल्या जन्मी 'नव्हाळीचा लेखक' होतो... (पॉझ घेत) तुमच्यासारखा...! हॅ हॅ हॅ... 

ठोंब्या (लाजत) : हो, हो... तसं आम्हाला सगळे ल्हानपणापासूनच ठोंब्या म्हणतात, ते त्यासाठीच. प्रकाशक तर हा हा म्हणता आम्हाला गुंडाळतात आणि खिशात ठेवतात. तर ते असो. तुम्ही बोला... 

सं. अ. : हां, तर आधी आपण मेहुण म्हणून गावभर मिरवून घ्यायचं. प्रत्यक्ष संमेलनात तर आपण आणि आपली लली - आय मीन - पत्नी या दोन व्यक्ती नसून, एकच व्यक्ती आहेत असाच भास सगळ्यांना झाला पाहिजे एवढं चिकटून राहायचं. लग्नाला तीस वर्षं झालीयत, की तीस मिनिटं असा संभ्रम पडेल, असं नवविवाहित जोडप्यागत वागायचं. खेटत राहायचं. खेटायचं सोडायचं नाही. हे पाहून काही काही लोक तर आहेराची पाकिटंही देतात. ती घालायची खिशात गपचूप...

ठोंब्या (डोळे विस्फारून) : काय सांगता? लेखकालाही पाकीट मिळतं? आम्ही तर फक्त पत्रकारांनाच मिळतं, असं ऐकून होतो.

सं. अ. (हसत) : म्हणूनच तुम्ही अगदी ठोंब्या आहात, एक नंबरचा ठोंब्या... 

(इथं सं. अ. प्रेमानं आमचा गालगुच्चा घेतील की काय, असे भय उत्पन्न झाले. आम्ही लगेच दूर पळालो.)

ठोंब्या : ते तर आहेच हो. पण एकूण संमेलनाध्यक्षांनी नुसतं मेहुण म्हणून मिरवलं असा तुमचा आरोप नाहीच्चे तर...

सं. अ. : नाही ना... तेच तर. अहो मला म्हणायचं होतं, की माजी संमेलनाध्यक्षांनी नुसतंच मेहुण मिरवलं. माझ्यासारखं 'नीट' नाही मिरवलं... कारण त्यांना शिकवायला मी नव्हतो ना तेव्हा!

ठोंब्या : अच्छा, अच्छा. आलं लक्षात. म्हणजे यापुढच्या संमेलनाध्यक्षांनी मेहुण म्हणून कसं मिरवावं हे तुमच्याकडूनच शिकावं असं म्हणता?

सं. अ. : अगदी. हे संमेलनाध्यक्षपद संपलं, की आम्ही तसा क्लासच काढणार आहोत. 'येथे उत्कृष्ट मेहुण कसे मिरवावे हे शिकवले जाईल,' असा बोर्डच टांगणार आहे खाली...

ठोंब्या : वा.. वा... क्लासला एक नाव सुचवू? मेहुणचार! कसं आहे?

सं. अ. : झक्कास... द्या टाळी...

इथं आम्ही टाळी द्यायला हात पुढं केला, तो हात कुणी तरी खस्सकन ओढला. सं. अं.नी असं का केलं, म्हणून पाहतो तो साक्षात आमचं अर्धांग समोर उभं! 'अहो, उठा. पुरणपोळ्या हादडून झोपलाय कधीचे. दोन तास झाले आता. उठा. आणि झोपेत टाळ्या कसल्या देताय हवेतल्या हवेत?..' हिचा चिरपरिचित वरचा 'सा' ऐकून आम्ही नीटच जागे झालो. काय झालं ते एकदम लक्षात आलं.
...आणि मग आम्ही हसून तिला म्हटलं, 'ठोंबे, दोन कप चहा टाक'!

---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, सप्टेंबर २०१६)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

फिरकीचा ठोंब्या - भाग ४

लेखक ग्रंथांच्या घरी...
--------------------------

सध्या दिवस कठीण आहेत. लेखकासाठी तर ते आणखीनच कठीण. आधी काही तरी लिहा, मग ते छापा, मग ते खपवा, मग साहित्याच्या हेडक्वार्टरी सभासद व्हा, मग पदाधिकारी व्हा, मग पुरस्कारासाठी सेटिंग करा, मग साहित्य संमेलन भरवा किंवा संमेलनाचे अध्यक्ष व्हा... केवढे व्याप अन् केवढे ताप! या सगळ्या गोंधळात हातून लेखन होतच नाही, हा परत वेगळा मुद्दा!
चांगलं दर्जाचं वगैरे सोडा, पण किमान वाचनीय, बरं असं काही लिहिण्यासाठीही प्रतिभेची भरपूर हॉर्सपॉवर लागते म्हणे. कुणास ठाऊक! मात्र, लेखनासाठी लेखकाला निरनिराळ्या कल्पना सुचाव्या लागतात, वगैरे जुना काळ झाला, हे नक्की! तसंही चार आण्याची भांग घेतली, की वाट्टेल तेवढ्या कल्पना सुचतात असं साक्षात लोकमान्यांनीच म्हणून ठेवल्यानं आम्ही त्या वाटेला फारसे जातच नाही. हल्ली आम्हास टीआरपीची चिंता असते. सुळावरच्या पोळीचे दिव्य करूनही पुस्तक खपेना, तसं आम्हाला टीआरपीच्या इतर काहीबाही कल्पना सुचू लागल्या. हल्ली आम्ही सोशल मीडियावर बराच काळ टीपी करीत असल्यानं तिथं तर या कल्पनांची अलिबाबाची गुहाच उघडलेली दिसत होती. एकदा वाटले, फेसबुकवरच पुस्तकाची वारेमाप जाहिरात करावी. पण आमचा चेहराच असा आहे, की तिथं फार काही लाइक्स वगैरे येण्याची शक्यता नव्हती. बाकी रेडिओ-टीव्ही वगैरे गोष्टी तर आमच्या बजेटमध्ये बसणाऱ्या नव्हत्याच. मग एकदम ग्रंथालयाची आठवण झाली. ग्रंथालय म्हणजेच लायब्ररी हा एक मोठा आधार होता यात वाद नव्हता. काही मोजक्या ग्रंथालयांत आपले पुस्तक ठेवावे; किमान ते अधिकाधिक लोकांपर्यंत जाईल, अशी आशा होती.
लेखक असल्यानं बऱ्याच दिवसांत ग्रंथालयात गेलो नव्हतो. वर आपण लेखक असल्याची जाहिरात आम्ही गावभर केलेली असल्यानं कुणाला ग्रंथालयाचा पत्ता विचारणं बरं दिसलं नसतं. अखेर एके दिवशी मंडईत भाजी आणायला गेलो असता, एका बोळात ग्रंथालयाचा बोर्ड दिसला. हे शासकीय अनुदानित ग्रंथालय दिसत होतं. आत गेलो. ग्रंथपाल महोदयांना भेटलो. पुस्तक दिलं. आधी त्यांनी खूप कामात आहोत, असं दाखवलं. मग आम्हीही 'केवढं काम पडतंय ना तुम्हाला?' असं म्हणून ग्रंथपालदादांच्या दुखऱ्या जखमेवर बोट ठेवलं. त्यानंतर सुमारे एक तास अर्ध्या कप चहावर आम्ही 'ग्रंथालय सेवकांच्या समस्या' या विषयावरचं एक मोफत व्याख्यान ऐकलं. एक नवं पुस्तक लिहिता येईल, एवढा ऐवज त्यात मिळाला. सरकारी अनुदानं लाटण्यासाठी ग्रंथालयांच्या या जगात काय काय चालतं हे कळलं. काही काही ठिकाणी तर स्वतःच्या छोट्या घरातच अनेकांनी कथित ग्रंथालय सुरू केलंय म्हणे. आपल्याच नातेवाइकांची संचालक म्हणून वर्णी लावायची. कमी किमतीत पुस्तकं घ्यायची, मग रद्दीत विल्हेवाट लावायची... असले अनेक प्रकार ऐकायला मिळाले. ही चुरस आणि चमत्कारिक बाजू आम्हास ठाऊक नव्हती. आता ग्रंथपाल महोदय आपलं पुस्तक तिथं ठेवण्यासाठी उलट आमच्याकडूनच भाडं वगैरे घेतात की काय असं वाटू लागलं. पण तसं काही झालं नाही. ग्रंथपाल महाशयांनी आमचं पुस्तक ठेवून घेतलं. किती लोक घेतील आणि वाचतील, हे मात्र विचारू नका, असं म्हणाले. मग सरकार ग्रंथालयांना भरपूर अनुदान देतं, तर लेखकांना का देत नाही, असा भाबडा प्रश्न आमच्या मनास तरळून गेला. लेखकांना अनुदान मिळू लागलं तर, या कल्पनेनं आमच्या प्रतिभेचा अश्व चौखूर उधळू लागला. पण सध्या अनुदान मिळत नाहीय या वास्तवाची जाणीव झाल्यावर तो पुन्हा तबेल्यात जाऊन चूपचाप उभा राहिला.
पायऱ्या उतरून खाली आलो. ग्रंथालयांमधल्या कित्येक पुस्तकांवरची धूळही कधी झटकली जात नाही. ज्ञानाचा, विद्वत्तेचा सागर आपल्या पानापानांत भरून घेणाऱ्या त्या मूक सोबत्यांना वाचा फुटली तर किती गुपिते उलगडतील नाही का! आम्हाला आता इतर ग्रंथालयांत काय चालते, हे पाहण्याची फारच ओढ वाटू लागली. दुसऱ्या एका ग्रंथालयात गेलो. हे अनुदानित ग्रंथालय नसावे, हे तिथली टापटीप आणि शिस्तशीरपणा पाहून लगेच कळले. आमच्या शहरात हौसेपोटी खिशातले पैसे खर्चून करून लोकांची ज्ञानार्जनाची भूक भागविणारे काही वेडे लोक होऊन गेले. त्यातल्याच काहींनी ग्रंथालये उभारली, काहींनी सामाजिक संस्था उभारल्या, तर काहींनी इतर अनेक विधायक कामं उभी केली. हे खासगी संस्थेनं चालवलेलं शिस्तशीर ग्रंथालय पाहून इथं आपलं पुस्तक असावं, अशी तीव्र इच्छा मनी दाटून आली. संस्था शिस्तशीर असल्याचं तिथं जागोजागी लिहिलेल्या सूचनांवरून स्पष्ट दिसत होतं. नेलेलं पुस्तक धड परत आणून देण्याबाबत तर एवढ्या कडक सूचना होत्या, की बहुतेक लोक ते पुस्तक न उघडताच आहे तसं परत आणून देत असावेत, असं वाटलं. पण तरी आम्हाला हे ग्रंथालय आवडलं. इथंही आमच्या पुस्तकाची एक प्रत दिली आणि निघालो.
ग्रंथालय म्हटलं, की आमच्या मनात फारच उदात्त भावना दाटून येतात. आमच्या कॉलेजचं ग्रंथालय आठवलं, की अनेक गोड गोड आठवणीही जाग्या होतात. तिथं आम्ही पुस्तकं कमी वाचली; पण माणसं जास्त वाचली! घरात नको असलेल्या मांजराला जसं वारंवार बाहेर काढतात, तसं तिथल्या काकांनी आम्हाला कित्येकदा बखोट धरून बाहेर काढलं आहे. मात्र, मांजरापेक्षाही अधिक चिवटपणानं आम्ही पुन्हा आमचा तिथला कोपरा गाठला आहे. आमच्या गावी असलेल्या ग्रंथालयाच्या आठवणीही फारच रम्य आहेत. आपणही लेखक व्हावं, हा किडा आमच्या डोक्यात घुसला तो तिथंच. अनेक नामवंत लेखकांची मोठमोठी पुस्तकं तिथं वाचली. ही पुस्तकं अनेकदा फारच मळकी, पानं दुमडलेली, कोपरे दुमडलेली, फाटलेली अशी असत. अनेकदा पुस्तकांतल्या ओळींखाली रेघा मारलेल्या असत. शेजारी मोकळ्या जागेत मनमोकळी कॉमेंटरी लिहिलेली असे. 'हे पुस्तक वाचू नका,' या बाळबोध सल्ल्यापासून सांगता येणार नाही अशा भाषेत लेखकाला व्यवसाय बदलण्याबाबत केलेल्या रोखठोक सूचना याच पुस्तकांमध्ये पाहायला मिळत. पण याचाच अर्थ तेव्हा ही पुस्तकं वाचली जात होती, अनेक लोक ती हाताळत होते, पाहत होते. कुठल्याही ग्रंथालयातल्या पुस्तकाला यापेक्षा भाग्याची गोष्ट कुठली वाटू शकेल? लेखकाप्रमाणंच त्याच्या पुस्तकालाही बोलता आलं असतं, तर त्यानंही कदाचित हेच सांगितलं असतं. आपल्या राज्यातल्या ग्रंथालयांनाही वाचा फुटली, तर त्यातल्या बहुतेकांचं मनोगतही अश्रूंसोबतच व्यक्त होईल असं वाटायला लागलं. आम्हा लेखकांसाठी पंढरीचं माहात्म्य असलेली ही ग्रंथालयं खरोखर आत्ता काय बिकट अवस्थेत आहेत, हे कळलं तर पुस्तकांबद्दल संवेदनशील असलेले समस्त रसिकजन हळवे झाल्याशिवाय राहणार नाहीत. अनेक ग्रंथालयांची अवस्था भयंकर आहे. ग्रंथालये चालवणारे लोक काय जिकिरीनं ती चालवत आहेत, हे अनेकांना माहिती नाही. फारच थोडकी ग्रंथालये उत्तम दर्जा टिकवून आहेत. पण बहुसंख्य ठिकाणी आनंदीआनंदच आहे. भ्रष्टाचारापासून ते सरकारी अनास्थेपर्यंत अनेक वाईट गोष्टींनी त्यांना खिंडीत गाठलंय. यावर उपाय कोण करणार? मन एकदम चिंताक्रांत झालं.
अशाच हळव्या अवस्थेत आम्ही आमच्या परमप्रिय पुण्यनगरीतल्या खाशा पेठेतल्या खाशा ग्रंथालयात शिरलो. 'कोण पाहिजे?' अशी केवळ या पेठेतच केली जाणारी तुच्छतादर्शक विचारणा समोरचे काका कानकोरण्यानं कान कोरत करते जाहले. त्यांच्या त्या आविर्भावानंच आम्ही गर्भगळीत झालो. 'पु.. पु... पुस्तक द्यायचंय,' हे शब्द कसेबसे फुटले. 'नव्हाळीच्या कविता' हे आमच्या पुस्तकाचं शीर्षक वाचून ते काका खेकसले, 'कविता नाही ठेवत... एक काम करा. शेजारी भेळवाला आहे. त्याला लागतात खूप कागद... तिकडं देऊन या...'
आम्ही क्षणार्धात हळव्याचे रडवे झालो. ग्रंथालयांना, त्यातही आमच्या पुण्यनगरीतल्या ग्रंथालयांना पुढील शेकडो वर्षं मरण नाही, हे सत्य उमजले. खाली येऊन पुस्तक शबनममध्ये कोंबलं आणि ओल्या भेळेची ऑर्डर दिली...

---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, ऑगस्ट २०१६)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...