29 Aug 2021

फिरकीचा ठोंब्या - भाग १०

बाळ(साहित्य)लीला...
--------------------------

आम्ही तसे हंगामी स्वरूपाचे गृहस्थ आहो. म्हणजे हिवाळ्यात आम्हाला थंडी वाजते, उन्हाळ्यात आइस्क्रीम खावेसे वाटते अन् पावसाळ्यात सर्दी होते... आपण चारचौघांपेक्षा वेगळे आहोत, असं दाखवून लब्धप्रतिष्ठित होता येतं, पण माणूस म्हणून जगायचं राहून जातं! आम्हाला वाटतं, आधी चारचौघांसारखं तरी जगून बघू; मग आपल्याला काय वेगळं जमतंय का ते बघू. तर ते असो. मुद्दा असा, की आम्ही ऋतुपालटाप्रमाणे बदलत जाणारे एक सामान्य संसारी सूक्ष्म जीव आहोत. त्यातही लेखकू आहोत. त्यामुळं आमच्याप्रमाणेच आमच्या झरणीलाही (हल्ली कळफलकाला) ऋतुपालटाचे वेध लागतात. आता उन्हाळा असल्यामुळं आम्हाला सुट्टीचा आनंद लुटावासा वाटतो. वास्तविक शाळा सुटून कित्येक वर्षं झाली. पण अजूनही शाळांना सुट्ट्या लागल्याच्या बातम्या वाचून पोटात कसल्याशा गुदगुल्या होतात. वाळ्याचे, कैरीचे, 'बरफ का गोला'चे वास येऊ लागतात. मन लहानपणीच्या निरागस आठवणींशी आट्यापाट्या खेळू लागतं...
लहानपणी या सगळ्या आठवणींसोबतच असायचा तो गोष्टींच्या पुस्तकांचा वास. माडीवरच्या खोलीत एका कोपऱ्यात बसून, वाटीत कुठला ना कुठला खाऊ घेऊन खात खात; अधूनमधून सांडगे, पापड, कुरडया इ. उन्हाळी वाळवणं तोंडात टाकत केलेली पुस्तकांची पारायणं आठवतात. या पुस्तकांतून एक वेगळीच प्रतिसृष्टी भेटायला यायची. अगदी लहानपणी परिराज्याची सफर घडली. 'पोपटात जीव असणारा राक्षस' नंतर बऱ्याच वेगवेगळ्या रूपात भेटला. (ते एक असो.) 'सिंड्रेला'पासून ते 'सिंदबाद'पर्यंत सगळ्यांच्या अद्भुत जगात फेरफटका मारता आला. आमच्या लहानपणी टीव्ही होता, पण कार्टूनच्या वाहिन्यांची रेलचेल नव्हती. त्यामुळं 'दूरदर्शन'वर लागणारा मिकी माउस आणि ही-मॅन, स्पायडरमॅन सोडल्यास टीव्हीवरच्या कार्टूनची फार नवलाई नव्हती. त्याउलट पुस्तकांतून भेटणाऱ्या कित्येक अद्भुत व्यक्तिरेखांनी कायमचं मनावर गारूड केलं. मनातल्या पडद्यावर वेगळंच कार्टून नेटवर्क सुरू व्हायचं. मग सुरस अन् चमत्कारिक अरेबियन नाइट्सच्या कथा असोत, किंवा 'चांदोबा'मधले विक्रम-वेताळ असोत... हे सगळे आमच्या चिमुकल्या भावविश्वाचा अविभाज्य भाग बनले होते. नंतर भा. रा. भागवतांचा 'फास्टर फेणे' भेटला... त्याच्याशी अगदी 'ट्टॉक' जमून गेलं. सुधाकर प्रभूंचा 'डिटेक्टिव्ह डीटी' आणि त्याची गँग पण फार आवडायची... ना. धों. ताम्हनकरांचा 'गोट्या', सानेगुरुजींची 'श्यामची आई' ही पुस्तकं वाचली नाहीत असा आमच्या पिढीतला एकही विद्यार्थी नसेल... याशिवाय थोरा-मोठ्यांची चरित्रं (विशेषतः राजा मंगळवेढेकरांनी लिहिलेली), शान्ताबाई शेळक्यांच्या सुंदर परदेशी अनुवादित कथा, नीलम प्रभूंची (दिल्लीतल्या) 'मांजराची गोष्ट' आणि अशाच किती तरी सुंदर पुस्तकांच्या आठवणी... या सगळ्या पुस्तकांनी आमचं बालपण समृद्ध केलं. ओल्या मडक्याला सुंदर घाट दिला, हे जग फार चांगल्या गोष्टींनी भरलेलं आहे आणि त्या सगळ्याचा आस्वाद आपण घेतला पाहिजे अशी उत्तम जगण्यासाठी आवश्यक असणारी मूलमंत्रासारखी गोष्ट या बालसाहित्यानं दिली...
पण पुढं जरा गडबड झाली... आम्ही मोठे झालो! लहानपणीचा निरागसपणा हरवला अन् हिशेबीपणा, बनचुकेपणा अंगी आला. वयानं वाढल्याची जाणीव ठायी ठायी त्रास देऊ लागली. मग आमच्या आयुष्यातून बालसाहित्य हद्दपार झालं. नीलम प्रभूंकडून विठ्ठल प्रभूंकडं प्रवास सुरू झाला. त्याचा इष्ट तो परिणाम झाला अन् विवाहोत्तर पराक्रमाचं फळ म्हणून आमचे चिरंजीव जन्मास आले. ('करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे' या वाक्यामागचं इंगित अचानक आम्हाला कळलं!) हा बाळजीव जरासा मोठा होताच बालसाहित्य आमच्या आयुष्यात पुन्हा परतुनी आले. पंचवीस वर्षांपूर्वीचा काळ आणि तेव्हाचं साहित्य आमच्या डोक्यात अजूनही फिट्ट बसलं होतं. पण आता मुलासाठी म्हणून पुस्तकं घ्यायला गेलो अन् ती नवी-नवेली, रंगबिरंगी पुस्तकांची दुनिया बघून हरखून अन् हरवून जायला झालं. अप्रतिम छपाई, रंगीत-गुळगुळीत कागद आणि त्यावर साकारलेली ती आंग्लभाषी परिकथा पाहून मला पुन्हा बाळपणात शिरलं. पण आता चिरंजीवांचा मान होता. आम्हाला पुन्हा लहान होण्याची परवानगी नव्हती. तरीही त्याच्या जोडीनं जेवढं लहान होता येईल तेवढं होऊन बघितलं. त्याच्या नजरेनं ही सगळी दुनिया पुन्हा अनुभवली. आता कार्टून नेटवर्कचा खजिना होता, जिंगल टून होतं, हॅरी पॉटर होता, वेगवेगळ्या सीडी-डीव्हीडी होत्या, नंतर तर यू-ट्यूब अन् इंटरनेट नावाची 'अलिबाबाची गुहा'च उघडली... हल्ली तर स्मार्टफोनमुळं सगळं काही खरोखर हाताच्या मुठीत आलंय... बालसाहित्य सोडून! त्यामुळं सगळं काही आहे, पण तरीही लहानपणच्या काही गोष्टी आपण मिस करतोय, असं सारखं वाटत होतं...
हल्लीच्या मुलांना पूर्वीसारखं दर्जेदार बालसाहित्य वाचायला मिळत नाही, याची अपार खंत मनात दाटून आली होती. यावर उपाय म्हणून आपणच बालसाहित्य प्रसवायचं, असा निर्णय आम्ही ऐन होळीच्या दिवशी घेऊन टाकला. (पुढं हाताची मूठ अनेकदा तोंडावर पालथी करायचा प्रसंग येणार आहे, याची तेव्हा कल्पना नव्हती.) प्रसवणे हा शब्द साहित्यनिर्मितीसाठी का वापरतात, याची कायमची आठवण करून देणाऱ्या वेदना पुढं सोसायच्या होत्या, ते वेगळंच!
आपला पहिला वाचक आपले चिरंजीवच असणार आहेत, हे आम्ही ठरवून टाकलं. त्यानुसार आम्ही सोप्यातली सोपी गोष्ट म्हणून कृष्णजन्माची कथा चिरंजीवांना सांगायला सुरुवात केली. देवकी आणि वसुदेवाचं आठवं अपत्य आपला नाश करणार आहे, वगैरे कथाभाग सांगून झाल्यावर चिरंजीव (वय वर्ष आठ) उद्गारले, 'बाबा, कंस वेडाबिडा होता का रे?' चिरंजीवांना कथेत रुची निर्माण झालीय हे पाहून आम्हाला स्फुरण चढले. 'अरे, वेडा नाही काही... दुष्ट होता अतिशय...' असं सांगून आम्ही कंसाच्या दुष्टपणाची वर्णनं करू लागलो. चिरंजीवांनी खास पुणेरी तुच्छतादर्शक हसू एवढ्या बालवयातही कमावलं होतं. ते चेहऱ्यावर आणून त्यांनी पुन्हा ठाम स्वरात सांगितलं, 'नाही बाबा. कंस वेडाच!' आता मात्र आम्ही खचलो आणि हताश होत म्हटलं, 'अरे बाबा, कसा काय वेडा?' तर चिरंजीव चिरंतन सत्य सांगत असल्याच्या आविर्भावात उद्गारले, 'अरे, देवकी आणि वसुदेवाचा मुलगा आपल्याला मारणार आहे, हे त्याला माहिती होतं, तर त्यानं त्या दोघांना वेगवेगळ्या तुरुंगांत का नाही ठेवलं?'....
आम्ही जागेवरच खल्लास... वारलो... दीर्घ शांतता...
मग बराच काळ आम्ही बालसाहित्याचं नाव काढलंच नाही. बालसाहित्य लिहिण्याचं सोडा, पण वाचण्याचंही आपलं वय अद्याप झालेलं नाही, याची खात्रीच पटली होती. मग आम्ही हळूहळू बालजगतातल्या लेटेस्ट घडामोडी जाणून घेण्यासाठी चिरंजीवांकडं शिकवणीच लावली. बाल आणि प्रौढ या दोन्ही जगांतलं चिरंजीवांचं ज्ञान पाहून दिसामाजी माझी बालबुद्धी प्रगल्भ होत चालली होती. चिरंजीव आता टीनएजमध्ये प्रविष्ट करते झाले होते. त्यामुळं इंटरनेटवरचा त्यांचा व्यासंग अगदी व्यासाच्या नसला, तरी त्रिज्येच्या कक्षेएवढा नक्कीच विस्तारला होता. आम्ही अद्याप परिघावरच होतो आणि ही 'जीव-भौतिक' 'रसायना'ची नवी 'भूमिती' समजावून घेत होतो. ती जाणून घेतल्यानंतर बालसाहित्य लिहिण्याएवढे आपण अजून मोठे झालो नसल्याची खात्री पटली. मग आम्ही पुन्हा शिशुगटाकडे आमचा मोर्चा वळवला. तीन-चार वर्षांच्या मुलांसाठी परीची आणि राक्षसाची गोष्ट लिहिणं हा आमच्या डाव्या हातचा मळ होता. झर्रकन एक गोष्ट उतरवून काढली. ती गोष्ट अगदीच 'चिमखडी, ऑच्ची ऑच्ची, काहीच्च्या काहीच्च गोडुली' वगैरे झाली होती, असं आमचं स्वतःचंच मत झालं. याचं कारण आमच्या गोष्टीतला 'लाक्षस'ही 'पली'शी 'बोबले' बोलच बोलत होता. पण ही चिमुकली बालकथुली प्रसिद्ध करण्यापूर्वी कुणाला तरी दाखवावी, म्हणून शेजारच्याच इमारतीत राहणाऱ्या आमच्या कौटुंबिक मैत्रिणीकडं गेलो. तिची कन्युकली तीन ते चार वर्षांचीच आहे. तर गेल्या गेल्या तिनं आपल्या लेकुकलीचं आजचं महत्त्वाचं वक्तव्य ऐकवलं... टीव्हीवरील एक थोर मराठी मालिका बघून लेकीनं तातडीनं तिच्या आईकडं काळजीनं चौकशी केली होती - 'आई, तू अन् बाबा एकमेकांवर नीट प्रेम करता ना?'
हे ऐकून मी बसल्या जागी कोलमडलो. मैत्रिणीनं दिलेली कॉफी अंगावर सांडली. तिची ती थोर विदुषी लेकुकली शेजारी उभी राहून आपल्या वेड्या काकाला खो खो हसत होती. आता काही वेळानं माझी ही अवस्था पाहून ती कन्या काही तरी मानसशास्त्रीय विश्लेषण करण्यासाठी एखादी प्रश्नावली सादर करील, या भीतीनं मी तिथून पळ काढला.
एवढं झालं, तरी बालसाहित्य प्रसवण्याची आणि त्यानिमित्तानं 'बालसाहित्यिक' होण्याची आमची हौस काही कमी होत नव्हती. कुठला वयोगट धरावा, हे काही निश्चित होत नव्हतं. अखेर काही तरी सर्व्हे करावा म्हणून एका ग्रंथप्रदर्शनात गेलो. तिथं एक काकूसदृश महिला बालसाहित्याच्या विभागात बरीच खरेदी करीत होत्या. आनंदाचा भाग म्हणजे त्या बऱ्याच मराठी पुस्तकांची खरेदी करीत होत्या. अगदी पाच-दहा, पंधरा रुपयांच्या परिकथांची पुस्तकं त्यांनी मोठ्या संख्येनं उचललेली पाहून आम्हाला बालआनंद झाला. बिल वगैरे करून त्या बाहेर आल्याबरोबर आम्ही त्यांना गाठलं. तुमची मुलं केवढी आहेत, ती मराठी गोष्टीची पुस्तकं वाचतात हे किती छान वगैरे प्रश्न विचारल्यानंतर बाईंनी त्रासिक चेहरा करून सांगितलं, 'नाही हो... आमची मुलं त्या अमुक-तमुक पब्लिक स्कूलमध्ये आहेत. ती नाही वाचत असलं काही... आमच्या भिशी मंडळातर्फे एका अनाथालयातल्या मुलांना पुस्तकं देणगी द्यायचा कार्यक्रम आहे. त्यासाठी नेतेय ही पुस्तकं...' असं म्हणून म्याडम त्यांच्या शोफर-ड्रिव्हन 'स्कोडा'त शिरल्या. आमचा चेहरा अगदी 'स्कोडा-मोरा' झाला. आता काय करावं कळेना. (या बाईंवर एक ललित कथा तर नक्की झाली, पण बालसाहित्य कसं लिहिणार!) एके काळी गोष्टी लिहिणाऱ्या काही बालसाहित्यकारांचे पत्ते घेतले, तर ते अमेरिकेत त्यांच्या नातवांचे लंगोट बदलायच्या कामगिरीवर रवाना झाल्याचं कळलं. काही का असेना, अजूनही 'शिशु'संबंधी गोष्टीच ते करीत आहेत, याचा एक फुसकट आनंद आम्हाला झाला!
याखेरीज आम्ही बालसाहित्य संमेलनाला कधी हजेरी लावली नव्हती. पण ज्या काही बातम्या वाचल्या/ऐकल्या, त्यावरून तिथंही काही बालिश वा बालसुलभ गोष्टीच घडत असल्याची खात्री पटली. वृत्तपत्रांत लहान मुलांच्या पानावर येणारं साहित्य आम्हीच काय, पण आमच्या घरच्या बालांनीही कधीच वाचलं नव्हतं. एकूणच बालसाहित्याची निर्मिती करण्यास आपण अगदीच नालायक आहोत, अशी खात्री दिवसेंदिवस पटत चालली होती. मोठ्यांच्या साहित्य संमेलनात एकदा बालसाहित्यावरचा परिसंवाद ऐकला होता. शेजारीच प्रौढांसाठीचा गंभीर परिसंवाद होता. पण वक्त्यांचं बोलणं ऐकून वक्त्यांची आणि विषयांची उलटापालट झाली की काय, असा दाट संशय मनी आला होता.
...अखेर आम्ही बालसाहित्यनिर्मितीचा नाद सोडला. पुन्हा प्रौढांच्या लिखाणाकडं वळलो. आमच्या वकुबानुसार एक अत्यंत रोमँटिक अशी प्रेमकथा लिहून काढली. ती लिहिताना दोन दिवस आम्ही आमच्या आंघोळीच्या पाण्यात गुलाबपाकळ्या सोडल्या होत्या. शिवाय रोज गुलकंद खात होतो. तिखट-खारट पूर्ण वर्ज्य केलं. (आंबट चालूच ठेवलं... ते लागतं...) खेरीज हाताला गजरा बांधूनच ऑफिसला जायचं मनात होतं; पण तो मोह आवरला. एवढं सगळं करून अत्यंत कष्टानं लिहिलेली, 'साखरांबा' ही आमची प्रेमकथा तयार झाली. आमच्या नेहमीच्या प्रकाशकांकडं पाठविली. अत्यंत उत्सुकतेनं उत्तराची वाट पाहत राहिलो. एक दिवस त्यांचा मेसेज आला - 'कथा आवडली. आपला पुढील महिन्याचा बालकथा विशेषांकच आहे... त्यात वापरू... मुलं खूश होतील!'
...अन् आम्हाला बालसाहित्यिक होण्याचं कोडं एकदम उलगडलं. त्या दिवसापासूनच आम्हाला 'ठोंब्या बालसाहित्यिक' म्हणून साहित्यशारदेच्या चरणी रुजू करून घेण्यात आलं!

---

(ता. क. : काही लोकप्रिय किस्से स्वतःचेच आहेत, असं दाखवून आपल्या लिखाणात घुसडण्याचं आमचं कौशल्य जाणकार वाचकांच्या लक्षात आलं असेलच. आम्ही लेखक म्हणून हळूहळू 'उत्क्रांत' होत असल्याची ती खूण धरून चालावी! इति विज्ञापना...)

---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, एप्रिल २०१७)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

----

फिरकीचा ठोंब्या - भाग ९

संमेलन : उत्तरपूजा...
-------------------------


आयुष्यात काही गोष्टी घडायचे योग यावे लागतात. त्यामुळंच डोंबिवली हे गाव आपल्याला अद्याप का घडलं नसावं, याचा आम्हाला विलक्षण खेद होत होता. वायव्य (म्हणजे नॉर्थ-वेस्ट) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असा किताब मिरवणारं, मुंबईत कोटात चाकरीला जाणाऱ्या मध्यमवर्गीय मराठी माणसांचं संध्याकाळी परतायचं घरटं असलेलं, पु. भा. भाव्यांपासून शं. ना. नवऱ्यांपर्यंत किती तरी मराठी साहित्यिकांचं निवासस्थान असलेलं आणि या साहित्यिकांना नको त्या ठिकाणी चावून नकोसं करणाऱ्या डासांचं वसतिस्थान असलेलं असं हे अलौकिक गाव आपण पाहिलं नाही, म्हणजे आपल्या आयुष्यात एक फार मोठी उणीव राहून गेली आहे, असंच आम्हाला गेल्या वर्षअखेरीपर्यंत वाटत होतं. मात्र, मराठी सारस्वताचा सर्वोच्च सोहळा असलेलं अ. भा. मराठी साहित्य संमेलन डोंबिवली नगरीत (पूर्व) होणार, हे वृत्त कळल्यानंतर ही उणीव दूर करण्याची मोठीच संधी चालून आली. आम्ही ठोंब्या असलो, तरी अशी संधी सोडण्याइतकेही ठोंबे नाही, याची विनम्र आठवण स्वतःलाच करून देत संमेलनाचा धावता दौरा करायच्या तयारीला लागलो. आम्ही आयोजकांच्या आवडीचे लेखक (किंवा खरं तर लेखिका!) आणि सेलिब्रिटी दोन्ही नसल्यानं संमेलनात आम्हाला कुणी फुकट नेण्याचा प्रश्नच नव्हता. स्वतःच्या खिशाला खार लावून संमेलनाला जाण्याइतपत आमचं साहित्यप्रेम शाबूत असल्यानं आम्ही फारसा विचार न करता गाडी काढली. वास्तविक संमेलनातील परिसंवादातील वक्ता, सूत्रसंचालक किंवा गेला बाजार समन्वयक म्हणून कसे स्थान मिळवावे याचे जाणकारांनी क्लासेस काढल्यास पहिल्या बॅचमध्ये सर्वांत पहिल्या बेंचवर आम्ही दिसू. कारण गेली वीस वर्षं दहा-बारा संमेलनांना जाऊनही ही युगत काही आम्हाला वश झालेली नाही. कुठलीही गोष्ट फुकट करताना आमच्या साहित्यप्रेमी मनास जो आनंद मिळतो, तो स्वतःच्या खिशातले पैसे उडवून होत नाही, ही वस्तुस्थिती होय. मात्र, आम्हाला आत्तापर्यंत कुणीही हिंग लावून न विचारल्यानं आम्हीच दर वेळी स्वखर्चानं संमेलनयात्रा करीत आलो आहोत.
आता संमेलनाचं धावतं वर्णन ऐकवायला हरकत नाही. कारण आम्ही स्वतःच्या चारचाकीतून तिथं पोचल्यानं हे शब्दशः 'धावतं' वर्णन होतं.
तर मंडळी, हा आहे शीळफाटा. खोपोलीजवळही एक शीळफाटा आहे. पण तो वेगळा! हा कल्याण शीळफाटा... (इथं येईपर्यंत रस्ता बरा असल्यानं आपण शीळ घालत गाडी चालवू शकतो.) इथं पनवेलकडून मुंब्र्याला जाणारा रस्ता मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या महामार्गाला छेदतो. (ही सर्वांत महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत आम्हाला कुणी दिली नाही.) इथं उजवीकडं वळायचं... समोर जे जांभळट डोंगर दिसतात, तेच शाळा कादंबरीतले सोनारपाड्याचे की जांभूळपाड्याचे डोंगर अशी आम्ही स्वतःची समजूत घालून घेतली. या रस्त्यानं अनाकलनीय संख्येनं मालट्रक जात असतात. त्यांच्या शर्यतीतून वाट काढत पुढं जिथं डोंबिवलीकडं डावीकडं वळा, अशी कुठलीही पाटी वगैरे नाही, तिथं डावीकडं वळायचं. पुढं सरळ गेलात तर तुमचं कल्याणच! तर आम्ही योग्य वेळी 'वाममार्गा'ला लागलो. आता अधूनमधून साहित्य संमेलनाचे बोर्ड दिसू लागले. डोंबिवली गाव सुरू झालं. गाव जसं असेल असं वाटत होतं, तसंच ते निघालं. अपेक्षेपेक्षा थोडं मोठं आणि आडवं पसरलेलं वाटलं. सुरुवातीला 'यज्ञेश देशी दारू बार' ही पाटी वाचली आणि पुलंच्या भाषेत सांगायचं तर गावाची 'प्राज्ञ पातळी' झटकन आमच्या लक्षात आली. पुढं एका अरुंद अशा रस्त्यानं दीर्घकाळ प्रवास केल्यानंतर अखेर संमेलनाचं स्थळ आलं.
बहुतेक साहित्य संमेलनांच्या परिसरात गेलं, की साहित्य संमेलनाचा एक खास वास येऊ लागतो. नव्या मंडपाच्या कापडाचा, धूळ बसावी म्हणून पाणी मारल्यानंतर बसलेल्या मातीचा, खाद्यपदार्थांच्या स्टॉलचा, ग्रंथदालनातून येणाऱ्या नव्या पुस्तकांचा आणि तिथं ये-जा करणाऱ्या हजारो माणसांचा असा तो संमिश्र वास असतो. डोंबिवलीत अगदी प्रवेशद्वारातून आत गेल्यावरही हा वास येईना, तसं थोडं अस्वस्थ व्हायला झालं. मुंबईच्या खाऱ्या वाऱ्याच्या हवेत हा वास लुप्त झाला असेल, अशी समजूत करून घेतली. मुंबईपासून हे गाव लांब असलं, तरी सगळा संपर्क, संदर्भ मुंबईचाच असतो. अकराच्या सुमारासच वाढलेला उकाडा हे संदर्भ आणखीच कर्कशपणे सांगू लागला. मुंबई म्हटलं, की लोकल स्टेशनांपासून ते रस्त्यापर्यंत सगळीकडं प्रचंड गर्दी असणार हे एक डोक्यात असतं. ती गर्दी इथं दिसेना, तेव्हाही काही तरी चुकल्यासारखं वाटू लागलं. डोंबिवली फास्ट सिनेमातल्या माधव आपटेसारखी बॅट फिरवून गर्दी गोळा करावी, असं काही वेळ वाटून गेलं. आगरी यूथ फोरमनं संमेलनाची तयारी आणि एकूण मंडप आदी व्यवस्था तर चोख केली होती. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच डाव्या बाजूला खाद्यदालन पाहिलं आणि महत्त्वाची चिंता मिटली. आत गेल्यावर समोरच दोन कारंजी आणि संतांचे पुतळे वगैरे होते. नंतर पुलं, कुसुमाग्रज, शांताबाई आदी लोकप्रिय लेखकांचेही पुतळे उभे केले होते. अनेक शाळकरी मुलं पुलंच्या (पुतळ्याच्या) गळ्यात हात घालून फोटो काढून घेत होती. एक मुलगा शांताबाईंच्या शेजारी उभा राहून फोटो काढत होता. तेव्हा तीन-चार शाळा मास्तरणी तिथं आल्या आणि 'ज्यांच्याबरोबर फोटो काढताय त्या कोण आहेत माहिताय का?' असं त्या मुलावर खेकसून गेल्या. वास्तविक पुतळा काढणाऱ्यानं त्या जेमतेम शांताबाई दिसतील असा पुतळा घडवला होता. तेव्हा तो त्या मुलाचा दोष नव्हता. मात्र, ही तर केवळ झलक होती. पुढं तर शाळेचं आणि ज्युनिअर कॉलेजचं आख्खं गॅदरिंग घडायचं होतं. त्या वेळी खरं तर जयंत नारळीकरांचा सत्कार वगैरे कार्यक्रम मुख्य मंडपात व्हायचा होता. मात्र, आम्ही पोचलो तेव्हा त्याची काही हालचाल दिसेना, तेव्हा आम्ही आमचा मोर्चा ग्रंथदालनाकडं वळवला. ग्रंथग्रामास रा. चिं. ढेरेंचं नाव दिलेलं पाहून बरं वाटलं. संमेलननगरीला पु. भा. भाव्यांचं, तर मुख्य मंडपाला शं. ना. नवरे यांचं नाव दिलं होतं, तेही अगदी योग्यच! ग्रंथग्रामात शिरलो, तर सगळीकडं शुकशुकाटच दिसला. आपण फारच लवकर आलो की काय, असं वाटू लागलं. मात्र, पुढं संपूर्ण शनिवारचा दिवस गेला, तरी या परिस्थितीत फारसा फरक पडल्याचं दिसलं नाही.
ग्रंथदालनांत आमचे अनेक प्रकाशक मित्र आपापली नामवंत पुस्तकं घेऊन सज्ज बसले होते. रसिकांनी यावं आणि या पुस्तकांवर उड्या टाकाव्यात अशीच त्यांची इच्छा होती. अनेक मोठमोठे लेखक त्या पुस्तकांच्या रूपानं आपल्या चाहत्यांची वाट पाहत होते. मात्र, गर्दी फिरकलीच नाही. लोक आलेच नाहीत. म्हणजे फारच थोडे आले; जेवढे यायला हवे होते तेवढे अजिबात आले नाहीत! काही शाळकरी मुलं आली होती. एका स्टॉलमध्ये लेखकाबरोबर त्यांना गप्पा मारताना, फोटो काढताना बघून छान वाटलं. मात्र, असे क्षण फार थोडे... दुर्मिळ पुस्तकं होती, लहान मुलांची पुस्तकं होती... मोठ्यांची होती, शहाण्यांची होती, वेड्यांची होती... सगळी पुस्तकं होती. पण वाचकस्पर्शासाठी आसुसलेली ही पुस्तकं बहुतांश अस्पर्शच राहिली...
वैतागून संमेलनाच्या मुख्य मंडपात गेलो. तिथं बालमेळावा की काय सुरू होता. एकूण शाळेचं गॅदरिंग सुरू असल्याची कळा त्या कार्यक्रमाला होती. नंतर परत जेव्हा आलो, तेव्हा काही महाविद्यालयीन तरुण-तरुणी भाषणं देत होते. ते पाहून कॉलेजचं गॅदरिंग सुरू आहे, असं वाटायला लागलं. एका स्कॉलर इ. मुलीनं मंचावरून बोलताना इंटरनेटचं महत्त्व एवढ्या ठसक्यात सांगितलं, की आम्हीही आमच्या भ्रमणयंत्रातील नेट प्याक चालू करून चॅटिंगचं महत्त्वाचं कार्य चालू केलं. एवढ्या मोठ्या विस्तीर्ण मंडपात शेकड्यानं खुर्च्या मांडल्या होत्या, पण त्या रिकाम्याच होत्या. उकाडा वाढला होता. त्यामुळं जो तो खाली मांडलेल्या मोठ्या पंख्याच्या तोंडासमोरची खुर्ची पकडून बसत होता. हे दृश्य गमतीदार होतं. 'पण या उन्हाच्या झळांपेक्षा रसिकांच्या दुष्काळाच्या झळा मनाला जास्त पोळत होत्या,' असं एक साहित्यिक वाक्य तत्क्षणीच सुचलं. आम्ही ते त्वरेनं डायरीत नोंदवून ठेवलं. अशी वाक्यं पुढं लेख वगैरे लिहिताना कामी येतात. त्या तरुणांच्या आवेशपूर्ण भाषणांनी आमची भोजनोत्तर पेंग उतरली आणि आम्ही तडक मंडप सोडला. अन्य मंडपी काय चालले हे पाहण्यासाठी डोकवावं, असं ठरवलं. तिसऱ्या मंडपात दुसऱ्या परिसंवादाच्या वेळी पहिलाच परिसंवाद चालू होता. अल्प श्रोते आणि अगम्य वक्ते यांचा सामना करण्यासाठी आम्हाला पुन्हा एक पंखा गाठणं भाग होतं. मागल्या बाजूनं छान झुळूक यायला लागली आणि आम्ही पुन्हा पेंगू लागलो. चहाच्या आठवणीनं जाग आली, तोवर मंडप ओस पडला होता. यानंतर दुसऱ्या मंडपाकडं आणि नाट्यगृहाकडं फिरकण्याचं धाडसच झालं नाही. तिथले कार्यक्रम आम्ही मनःचक्षूंचा प्रोजेक्टर ऑन करून जागच्या जागी पाहिले आणि संबंधित वक्त्यांना दाद देऊन टाकली. खाद्यदालनाच्या स्टॉलांवर गेलो, तर तिथं मात्र गर्दी उसळलेली दिसली. मंडप मोकळे आणि बाहेर गर्दी याचं कोडं उकलेना. मुख्य मंडपासमोर एक मोठी लेखणी मनोऱ्यासारखी उभी केली होती आणि दोन्ही बाजूला पायऱ्या करून या पेनात शिरण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. त्या पेनापेक्षा मंडपात गर्दी कशी शिरेल याची काही तरी व्यवस्था व्हायला हवी होती, असं राहून राहून वाटायला लागलं. लेखणीचा मनोरा हा एक सेल्फी पॉइंट होता, याचा आम्हाला अंमळ उशिराच उलगडा झाला. मात्र, तो झाल्याक्षणी आम्ही तातडीनं तेथे जाऊन सेल्फी काढला आणि सोबतच्या डायरीत एक आयटेम पूर्ण केल्याची 'टिक्' करून टाकली. ग्रंथग्रामात वारंवार जाणं झालं. तिथल्या मंडपाचा वरचा पडदा फारच पातळ असल्यानं सूर्यमहाराज डायरेक्ट अंगावर येत होते. त्यात स्थानिक हवेतला उकाडा... अशा वातावरणातही तिथं चहा विकणाऱ्या पोऱ्याचं आणि तो विकत घेणाऱ्यांचं कौतुक वाटल्यावाचून राहिलं नाही. चहावाल्याला अच्छे दिन आले आहेत, हे खरं; पण पुस्तकांना कधी येणार, याचा विचार करीत आम्ही आणखी अर्धा-एक तास पंख्याशेजारी घालविला. नंतर घर्मबिंदू टिपून, उरलेल्या स्नेह्यांच्या भेटी-गाठी घेतल्या. वर्षानुवर्षं संमेलनाला हजेरी लावणारे काही उत्साही चेहरेही या वेळी दिसले नाहीत, तेव्हा खरंच खट्टू वाटलं. परिस्थितीचा जरा कानोसा घेतला असता, आणखी काही स्थानिक राजकीय कारणंही सापडली. ती ऐकून हसावं की रडावं, ते कळेना. अखेर दोन्ही करू नये, असा निर्णय घेतला आणि चेहरा निर्विकार ठेवला.
आवडते कवी द. भा. धामणस्कर हे डोंबिवलीचे. आदल्याच दिवशी संमेलनात त्यांचा सत्कार झाला होता. त्यांच्या घरी जावं आणि भेटावं असं फार वाटत होतं. पण तो योग नव्हताच. अखेर डोंबिवलीतल्या त्या प्रसिद्ध गणेश मंदिरात मात्र जायचं असं नक्की ठरवलं. डोंबिवलीतल्या बारीकशा रस्त्यांतून वाट काढत अखेर त्या मंदिरात पोचलो आणि त्या गजाननालाच प्रश्न गेला, हे बुद्धिदात्या, तुझे इथले सगळे भक्त का बरं रुसले संमेलनावर? बाप्पा काही बोलले नाहीत. बाहेर आलो आणि फेसबुकवर विनोद वाचला. एक जण डोंबिवलीतल्या माणसाला विचारतो, अरे, तुझ्या गावात संमेलन भरलंय आणि तू का गेला नाहीस? त्यावर तो म्हणतो, की अरे, ते संमेलन डोंबिवली पूर्वमध्ये आहे. मी पश्चिमेला राहतो....
हा विनोद वाचला आणि बाप्पांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं... आम्ही थोड्याच वेळात दक्षिण दिशेची, अर्थात पुण्यनगरीची वाट धरली. इति डोंबिवली संमेलनाच्या अपूर्ण उत्तरांची कहाणी उत्तरपूजेसह समाप्त!


---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, मार्च २०१७)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

---

फिरकीचा ठोंब्या - भाग ८

लेखकराव संमेलनात...
---------------------------


साहित्य संमेलनाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली, तसतसे आम्ही आधी उत्सुक, मग उत्साही, मग उल्हसित, मग उतावळे आणि शेवटी शेवटी उन्मनी होऊ लागलो. आमचे चित्त स्थिर नाहीसे बघून सौं.नी आठवडाभराची रजा टाकून आमच्या सभोवती स्वतःचाच पहारा ठेविला. मागल्याच्या मागल्या वेळी आम्ही असेच महिनाभर आधीच स्टेशनवर जाऊन 'घुमान घुमान' असं ओरडत अनवस्था प्रसंग ओढवून घेतला होता. तेव्हापासून आमचे इस हा एक मोठा घोरच लागून गेला आहे. तरी गेल्या वेळी 'पिंपरी पिंपरी' ओरडण्यानं फार नुकसान झालं नाही. फक्त बसस्टॉपवरच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने आम्हास हात धरून निगडीच्या बसमध्ये बसवून दिलं होतं, एवढंच! पौड फाट्यास उतरून आम्ही वेळीच स्वगृही परतलो तो भाग निराळा. तर आमचे हे असे होते... संमेलन सुरू होण्याच्या आधी साधारण महिनाभर आमचे मनपाखरू सैरभैर होऊन जाते. यंदाही तेच झाले आहे. आमचे 'अचपळ मन' केव्हाच डोंबिवली नगरीत जाऊन पोचले आहे. उठता बसता मन 'डोंबोली डोंबोली' गात्ये आहे.... आमच्या मनकवड्या अर्धांगिनीनं 'डोंबलं तुमचं...' असं हिणवूनही झालं आहे. त्यावर 'डोंबलं नाही गं, डोंबोली तुमची म्हण...' असा एक अतिकरुण पीजेही करून झाला आहे. त्यावर धर्मपत्नीनं अन्य शस्त्रे हाती धरली आणि आम्ही डासाच्या चपळाईनं तिचा मार चुकवीत घराबाहेर पडलो. पण बाहेर पडतानाही रस्त्यावर त्या कमानी लागल्या आहेत, ग्रंथदिंडी निघाली आहे, त्यात साहित्यिक कमी आणि गावातले चमको कार्यकर्ते जास्त असे नेहमीचे चित्र दिसते आहे, संमेलनाध्यक्ष अवघडून बसले आहेत, फडके रोडवर या निमित्ताने गुढीपाडव्याचाच रिपीट शो सादर होत आहे, संमेलनस्थळी हजारो जणांची पायधूळ उठल्यानं वातावरण धुळकट झालेलं आहे, ग्रंथप्रदर्शनाच्या दिशेनं कोऱ्या पुस्तकांचा करकरीत वास हवेवरून आमच्या नासिकाग्रास गुदगुल्या करितो आहे... असलीच काहीबाही दृश्यं आम्हास दिसू लागली...
आम्ही गेली कित्येक वर्षं संमेलनाची वारी करतो आहोत... मात्र, दर वेळी संमेलन जवळ आलं, की अस्मादिकांस नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. हा आपला घरचाच उत्सव आहे, असं वाटत राहतं. त्या संमेलनाच्या ठिकाणी खरं तर आम्हाला कोणी किंमत देत नाही. मात्र, तरीही तिथं आपलेपण वाटतं. उगाचच घरचं कार्य असल्याचा फील येतो. बाकी हा उत्सव मजेदारच असतो म्हणा. ज्यांनी तिथं यावंसं आपल्याला वाटतं, त्यांना काही ते आवडत नाही. आणि ज्यांचं तोंडही पाहण्याची इच्छा नसते असे लोक एलईडी स्क्रीनवर सगळीकडं अगदी मोठमोठ्या क्लोजअपमध्ये दिसत राहतात. पण ते काही असलं, तरी संमेलनाच्या नादानं आम्ही सारंच चुपचाप सहन करतो. खरं तर संमेलन जिथं भरेल तिथं जाऊन त्या गावची संस्कृती अनुभवावी, असं आम्हास वाटत असतं. एखाद्या जत्रेला जावं तसंच हे असतं. जत्रेतलं सगळं आकर्षण तिथल्या मज्जेच्या गोष्टींमध्येच तर असतं. पण संमेलनाला जायचं तर ते आपल्या मित्रांसोबत! एकट्यानं संमेलनाला जाणं हे एकट्यानं हनीमूनला जाण्याइतकंच खुळचटपणाचं आहे, असं आमचं स्पष्ट मत आहे. चार आपल्यासारखेच वाया गेलेले मित्र जमवावेत, गाडी काढावी आणि संमेलननगरीच्या दिशेनं कूच करावं, हा आता आमचा एक प्रघातच पडून गेल्यासारखा झाला आहे. वाटेत मनमौजेची ठिकाणं पाहावीत, हसत-खिदळत प्रवास करावा आणि इष्टस्थळी पोचून स्वर्गप्राप्तीचा आनंद घ्यावा, असा हा साहित्यप्रेमाचा मामला आहे.
संमेलनस्थळी आम्हास सर्वांत अधिक आकर्षण कशाचे वाटत असेल तर ते पुस्तकांच्या प्रदर्शनाचे. अस्मादिकही किंचित लेखकू असल्यानं अक्षरं लिहिणारे आणि त्याचं मोल जाणून ते छापणारे असे सगळेच आम्हास 'आपुल्या जातीचे' वाटतात. एरवी एवढे मोठे पुस्तकांचे स्टॉल एका ठिकाणी दिसणं कठीण. या गर्दीत घुसावं, आनंदात विहरावं, पाहिजे ती पुस्तकं बघावीत, हाताळावीत, वाचावीत, विकत घेऊन झोळीत टाकावीत आणि पुढला स्टॉल गाठावा यात आम्हास वेगळाच आनंद लाभतो. अशा या गर्दीत कुणी कवी भेटतात, कुणी लेखक भेटतात, कुणी प्रकाशक भेटतात. कवी प्रेमाचे असतील, तर तिथंच कविता ऐकवतात. आधी आम्ही, आमचे मित्र आणि कवी एवढेच उभे असतो. मग कवी कविता गाऊ लागतात... हळूहळू कोंडाळे मोठे होते. भोवती गर्दी जमते. लोक कवीला ओळखतात. खूश होऊन टाळ्या वाजवतात. कवीला कविता लिहिल्याचे समाधान, आम्हाला ती फुकटात ऐकता आल्याचे दुप्पट समाधान! असा हा राजीखुशीचा मामला असतो. कवी मस्त तंद्रीत मान डोलवत, झोळी सांभाळत निघून जातात. पुढच्या स्टॉलवर कुणी होतकरू लेखक भेटतात. नव्या कथांबाबत भरभरून बोलतात. आम्हीही होतकरूच असल्यानं त्याच्या 'हो'मध्ये 'हो' मिसळतो... होतकरू लेखकही समाधान पावतो. शेजारून जाणाऱ्या पोऱ्यास थांबवून कटिंग चहा पाजतो. होतकरू लेखकाकडं सुट्टे पैसे नसतात. आम्ही खिशातून पैसे काढून चहाचे पैसे देतो. होतकरू लेखक 'भेटू एकदा' हे अत्यंत पोचट वाक्य फेकत, ओशट हसत तिथून निघून जातो. आमची पुस्तकं पाहायची राहूनच जातात. पुढल्या पुस्तक गल्लीत प्रकाशकच भेटतात. वर्षानुवर्षं प्रकाशकांना भेटत असल्यानं आम्ही स्वतःच चहावाल्या पोरास हाक मारून प्रकाशकरावांना चहा पाजतो. प्रकाशकही शुगरचं कारण सांगत आधी नाही म्हणतात, पण मग हळूच अर्ध्यातला अर्धा कप चहा आमच्या चहात ओतत बाकीचा चहा भुर्रकन पिऊन टाकतात. मग 'अरे, ही संमेलनाची गडबड संपली, की निवांत पुण्यात भेट... तुझ्या पुस्तकाचं नक्की करून टाकू,' हे - गेली चार संमेलनं नित्यनियमानं ऐकवत असलेलं वाक्यच पाचव्यांदा आम्हास ऐकवतात आणि त्यांच्या स्टॉलवर उभ्या असलेल्या 'सुबक ठेंगणी'कडं मोर्चा वळवतात. या नवोदित लेखिका.... यांना आम्ही चांगलेच ओळखून आहो. लेखिका नवोदित असल्या, तरी चतुर आहेत. पापण्यांची पिटपिट पिटपिट न करताही चार प्रकाशक पर्समध्ये ठेवून आहेत. आत्ताच त्यांनी पलीकडच्या मंडपात 'विशुद्ध साहित्य व्यवहारातील स्त्रीवादाची बीजे' या की असल्याच काहीशा विषयावर जोरदार भाषण ठोकलंय. गेल्या वर्षी त्या कवयित्री म्हणून आल्या होत्या. यंदा लेखिका झाल्या आहेत. पुढल्या वर्षी समीक्षिका होतील आणि दोन-तीन वर्षांत कदाचित अध्यक्षाही होतील... त्या विदुषीला लांबूनच हात जोडून आम्ही दालनातून सटकतो...
ग्रंथदालनाच्या बाहेर एक मीडियावाला दादा हातात त्याचं ते बाजरीच्या कणसासारखं बोंडूक घेऊन एका महनीय प्रकाशकांची मुलाखत घेताना दिसतो. यंदा ग्रंथविक्री कशी कमी आहे, याची दर वर्षीचीच टेप त्यांनी लावली आहे. वास्तविक गेल्याच महिन्यात यांच्या चौथ्या दालनाचं आमच्या गावात उद्-घाटन झालंय. पण 'ग्रंथविक्रीतून आपल्याला पैसे मिळतात' हे जाहीरपणे सांगितल्यास बाकीचे प्रकाशक आपल्याला बहिष्कृत करतील, असं त्यांना वाटत असावं. तिथं काही वेळ ती करमणूक ऐकली आणि पुढं निघालो. एकूणच अशी मनमज्जेची बरीच ठिकाणं या परिसरात बघायला व ऐकायला मिळतात. पुढं मनोरंजनाची खाण म्हणावी असा कार्यक्रम सुरू होता. नवोदित कवींचा हा कट्टा. या कट्ट्याच्या भोवती तुडुंब गर्दी दिसतेय. या कट्ट्यात भाग घेणारे सगळे कवीच प्रेक्षक म्हणून उपस्थित असतात. सहज त्या गर्दीत घुसून डोकावून पाहिलं, तर फेसबुकवर स्त्रीवादी कवितांचा पाणलोट काढणाऱ्या भगिनी साक्षात समोर... फेसबुकवरच्या प्रोफाइल पिक्चरांचा आमचा दांडगा अभ्यास असल्यानं ५० मीटर अंतरावरूनही आम्ही त्यांना शार्पच ओळखले. स्त्री-पुरुष आदिम नात्याविषयी त्या काही भाष्य करू पाहत होत्या. त्या चिवट नात्यातल्या काही नाजूक प्रसंगांची वळकटी ताईंनी तिथं जवळपास संपूर्ण उलगडून दाखविली. त्यातल्या काही शब्दांच्या उच्चारणाचीही आम्हाला भीती वाटते, त्यामुळं ते इथं लिहिणं तर दूरच. पण बाईंच्या तीव्र भावनांनी त्या वीस-तीस ओळींमध्ये त्यांना त्रास देणाऱ्या नराचं किंवा नराधमाचं एवढं रक्त काढलं होतं, की आम्हाला त्या कल्पनेनंच गरगरायला लागलं. आम्ही मनातल्या मनात कवितेला डिसलाइक करून पुढं निघालो. बाईंना पुढल्या वर्षी साहित्य अकादमी किंवा गेला बाजार राज्य शासनाचा वाङ्मयीन पुरस्कार लाभल्याशिवाय राहत नाही, हे आम्ही मनातल्या वहीची खूण दुमडून नोंदवून ठेवलं. (आम्ही कुडमुडे लेखकराव असल्यामुळं दुसऱ्याला काहीही सन्मान वा पुरस्कार मिळाला, तर इकडं अशक्य पोटदुखी सुरू होते, हे नम्रपणे नमूद केलेलं बरं!)
आता मुख्य मंडपात जाण्याशिवाय उपाय नव्हता. तिथं ही गर्दी होती. आत पाहिलं तर सगळीकडं कार्यकर्ते दिसत होते. भगव्या, निळ्या, हिरव्या इ. रंगांची 'वादळं' म्हणे घोंघावत होती. पाऊल टाकायला जागा नव्हती. शेजारच्या चार माणसांच्या डोक्यातून, कानांतून, बगलांतून जे काही समोर मोठ्या स्क्रीनवर दिसत होतं, ते पाहू लागलो. राज्याचे भाग्यविधाते असे मोठे नेते बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री, अर्धं मंत्रिमंडळ, राज्याचं केंद्रात प्रतिनिधित्व करणारे दोन वजनदार, एक मध्यम आणि एक हलके केंद्रीय मंत्री आदी विराजमान होते. भाग्यविधाते सांगत होते, की साहित्यिकांनी राजकारण करू नये. एकोप्यानं, न भांडता राहावं... वादग्रस्त काही लिहू नये, जुनी मढी उकरू नयेत, स्वतःचे पुतळे उभारू नयेत, उभारले तर कधी तरी ते गटारात जातील याची खात्री बाळगावी, काहीही लिहिण्यापूर्वी शक्यतो आमच्याकडूनच तपासून नेलं तर बरं इ. इ.
साहेब अजून खूप काय काय सुंदर विचारधन उधळत होते... छानच वाटलं ते ऐकून. पण समोरच्यांच्या घामाचा वास असह्य व्हायला लागला, तसं आम्ही डोकं बाहेर काढलं. जरा मंडपापासून दूर कोपऱ्यात गेलो. तिथं गार वार वाहत होतं. तिथं फारशी गर्दी नव्हती. बरं वाटलं. पलीकडं एक गॉगलवाले गृहस्थ इयरफोनवर काही तरी ऐकत होते... माणूस कुठं तरी पाहिल्यासारखा वाटला. एकदम आठवलं, अरेच्चा, हे तर संमेलनाध्यक्षांसारखेच दिसताहेत. आम्ही मग जरा धाडस करून त्यांच्या जवळ जाऊन हे सांगितलं... तर ते म्हणाले, कुठं बोलू नका. तो मीच आहे. संमेलनाध्यक्ष! हे ऐकून आम्ही तीन ताड उडालो. म्हणालो, अहो, मग तिकडं कोण आहे व्यासपीठावर? तर त्यावर ते म्हणाले, 'खुर्च्या कमी पडल्या मंत्र्यांना. मग मीच म्हटलं, अहो, तुमचं चालू द्या. मी आहेच की तीन दिवस. तसाही आत्ता माझा आवडता कार्यक्रम असतो रेडिओवर. तो ऐकायला आलोय बाहेर....'
आम्ही म्हटलं, कोणता कार्यक्रम? तर त्यावर ते भले गृहस्थ म्हणाले, 'मन की बात'!

----

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, फेब्रुवारी २०१७)

---
पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

फिरकीचा ठोंब्या - भाग ७

डोंबिवली फास्ट
--------------------

तब्बल ५० दिवाळी अंकांत लेख पाडून पाडून आमचा गरीब, लेखकू जीव अगदी शिणून गेला होता. हलवायाला बुंदीच्या लाडवांचा ढीग पाहूनही त्याविषयी किंचितही आसक्ती वाटत नाही, तीच स्थिती आमची झाली होती. हे सगळे अंक पाहण्याचेसुद्धा कष्ट झाले नाहीत. अशा अगदी गलितगात्र, म्लान स्थितीत आम्ही बसलो असतानाच सुखद वाऱ्याची झुळूक यावी तशी ती खबर टीव्हीच्या पडद्यावर झळकली - 'आगामी साहित्य संमेलन डोंबिवलीत भरणार... 'अहाहा! वाहव्वा, वाहव्वा! कुस्तीचा फड लागल्यावर पहिलवानाला आणि तमाशाचा फड लागल्यावर 'बाइल'वानाला जो आनंद होईल, त्याच दर्जाचा आनंद आमच्या ठोंब्या मनाला झाला. पण हे सार्वजनिकरीत्या सांगणं बरं दिसत नाही, म्हणून आम्ही नेहमी आमच्या संमेलन दौऱ्याला पंढरीच्या वारीची उपमा देतो. 'बारी'ची 'वारी' झाली, की आमच्या लुच्च्या-लुब्र्या मनाला आध्यात्मिक आनंद होतो. तर सांगायचा मुद्दा असा, की एक (कसा का असेना) लेखकू असल्यानं आम्ही डोंबिवलीला जाणार हे आता निश्चित झालं आहे... डोंबिवली म्हटलं, की आम्हाला 'डोंबिवली फास्ट' हा सिनेमाच आठवतो. त्यातला तो माधव आपटे नावाचा संत्रस्त नायक आठवतो. हातात बॅट घेऊन त्यानं गावभर घातलेला धिंगाणा आठवतो. गेल्या अकरा वर्षांत आमच्या आजूबाजूच्या जगात भलताच फरक पडला आहे. विशेषतः सोशल मीडिया आल्यापासून तर आम्ही गप्पगार झालो आहोत. आमचा जो काही उद्रेक व्हायचा तो एक तर फेसबुकीच्या पोस्टवर नाही तर व्हॉट्सअपच्या फॉरवर्डवर होतो. (निशिकांत कामतलाही आज 'डोंबिवली फास्ट' काढायचा झाला असता, तर माधव आपटे फेसबुक अन् व्हॉट्सअपवर सगळी चिडचिड व्यक्त करतो, असं दाखवावं लागलं असतं आणि सिनेमाचं नाव कदाचित 'डोंबिवली पोस्ट' असं ठेवावं लागलं असतं. तर ते एक असो.)
डोंबिवली अजून एका कारणासाठी आम्हाला ठाऊक आहे. डोंबिवलीचे डास ख्यातनाम आहेत म्हणे. आम्ही कधी अनुभव घेतला नाही; पण मराठी सारस्वताचं बरंचसं रक्त याच नगरीतून शोषलं गेल्याच्या शोषितांच्या कहाण्या प्रसिद्ध आहेत. याचं नेमकं कारण शोधू गेलं असता, असं दिसून आलं, की मराठी साहित्यिकांना संध्याकाळच्या वेळी भोकाभोकांच्या बनियनवर आपल्या दीड बाय अडीच फुटाच्या ग्यालरीत (याला स्थानिक भाषेत गच्ची हा अधिक नेमका शब्द आहे...) बसून 'प्रतिभासाधन' करण्याची घाणेरडी सवय आहे. (तरी इथं 'बसून' या शब्दाला 'कोट' घातलेला नाही. तो घातला असता, तर डास चावले नसते, पण कोटीक्रम पूर्ण झाला असता. तर ते असोच.) आता नेमकी हीच वेळ डासांच्याही रुधिरशोषणाची असल्यानं मराठी साहित्यिकांच्या बनियनच्या भोकाभोकांमधून साहित्यनिर्मितीच्या सर्व केंद्रांवर डास संप्रदायाकडून तीव्र दहशतवादी हल्ले चढवण्यात येतात. खरं तर ही बाब खचितच शोचनीय आहे. पण डोंबवलीचे साहित्यिकही गच्चीत बसणं सोडत नाहीत आणि डोंबवलीचे डासही त्याच साहित्यिकांचं रक्त शोषून मोठे झालेले असल्यानं त्यांनी माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा डोंबिवलीचं हे एक पुरातनकालीन सत्य होय. ते आताही कायम आहे की नाही, याची कल्पना नाही. पण डोंबवलीच्या महापालिकेनं तेथील डास नष्ट केले असतील, तर तिनं त्या शहराचा सांस्कृतिक ऐवजच नष्ट केलाय, असं म्हणायला हरकत नाही.
डोंबिवली म्हटलं आम्हाला आणखी आठवते ती 'शाळा' ही बोकिलांची कादंबरी. या कादंबरीतलं गाव म्हणजे चाळीस वर्षांपूर्वीचं डोंबवली गावच! तेव्हा इंग्लंडात गेलं, की आमची साहित्यिक माणसं जसं शेक्सपिअरचं घर शोधायला धाव घेतात, तद्वत आम्हीही डोंबिवलीत गेलो, की म्हात्रेशेठच्या 'चाली' आणि शिरोडकरचं घर शोधणार आहोत. आणि हो, ते गणपतीचं मंदिर पाहण्याचीही आम्हाला एक चावट उत्सुकता लागून राहिली आहे. आमची साहित्यिक यत्ता 'नववी' हीच असल्यानं ते योग्यही ठरेल...
आणखी डोंबिवली म्हटलं, की आम्हाला आठवते ती तिथली गुढीपाडव्याची 'शोभायात्रा'. मराठी नववर्षाला निघणाऱ्या मिरवणुकीला 'शोभायात्रा' हा नवा शब्द बहाल करून मायमराठीची सेवा केल्याबद्दल डोंबिवलीच्या अभिनंदनाचा विशेष ठराव या संमेलनात मंजूर झाला पाहिजे, अशी आग्रहाची मागणी आम्ही करीत आहोत. डोंबवलीतल्या फडके रोडवर भगवे फेटे घालून, नथबिथ घालून, नववाऱ्या नेसून सर्व मराठी पेपरांत झळकणाऱ्या डोंबवलीच्या सुंदरी तिथल्या संमेलनातही दीपप्रज्वलन वा सत्कार प्रसंगी स्टेजवर मिरवताना दिसतील, अशी आमची आपली एक 'छोटी सी आशा' आहे. बाकी या 'शोभायात्रा' शब्दावरून मुंबई आणि पुण्याच्या मराठी पेपरांत भांडणं लागली होती हो एके काळी... 'शोभा होणे' याचा अर्थ कळतो का, असा कुचकट, पेठीय सवाल पुण्यातल्या वृत्तपत्रांतले मोठमोठे लोक करताना ऐकलं होतं. पण डोंबवलीकरांना त्याची फिकीर नव्हती. त्यांनी तो शब्दही सोडला नाही आणि ती यात्राही सोडली नाही. मराठमोळ्या मिरवणुकीला एक हिंदी शब्द लाभला, यातच आम्हीही आनंद मानून टाकला. बाकी डोंबिवली म्हटल्यावर आणखी काय आठवणार? हां, ते एक शं. ना. नवरे नावाचे लेखक इथंच राहायचे म्हणे. बरं लिहायचे असं ऐकतो. असतील असेच कुठले तरी मध्यमवर्गीय, पापभिरू लेखक! असं 'आनंदाचं झाड' आता उगवत नाही, असं कुणीसं म्हणालं. लोक काय, कशासाठीही गळे काढतात... जाऊ द्या... आपण आपलं डोंबवली पुराण सोडू नये...
...तर अशा ऐतिहासिक गावी जायचं म्हटल्यावर आमच्या मनाला काव्यमय आनंद झाला. संमेलनाध्यक्षपदी कुणी डॉ. काळे निवडून आले म्हणे. 'मतपत्रिकेमाजी काळे-दवणे, काय निवडावे निवडणारे?' असला काही प्रश्न मतदारांना पडलेला दिसत नाही. मराठी भाषा जणू मृत्युशय्येवर पहुडली असून, तिला अनास्थेचे डास चावून दुरवस्थेचा डेंगी झाला असावा, असं मतदारांना वाटलं की काय, कोण जाणे! आणि रोगी आजारी म्हटल्यावर उपचाराला डॉक्टर हवेतच. म्हणून काळे डॉक्टरांना पाचारण केलेलं दिसतंय. शिवाय 'अक्षयकुमार' या नावाची जादू महिला मतदारांवर पडलीच नसेल, असं काही ठामपणे म्हणता येत नाही. अर्थात अध्यक्ष कुणी का होईना! आपल्याला काय करायचं आहे! आपली 'साहित्यिक सैर' व्यवस्थित झाली म्हणजे झालं. सवाई गंधर्व महोत्सवात नाही का, समोर कोण गातंय यापेक्षा आपण ते कुणाबरोबर ऐकतो आहोत, यालाच अधिक महत्त्व असतं! तसंच आहे हे... सव्वीस जानेवारीच्या परेडमध्ये राष्ट्रपतींना आणि सिनेमाच्या प्रीमिअरमध्ये दिग्दर्शकाला जेवढं महत्त्व असतं, त्याहून अधिक महत्त्व संमेलनाध्यक्षाला असतं, असं वाटत नाही. थोडक्यात, डोंबिवलीच्या 'शोभायात्रे'त संमेलनाध्यक्ष म्हणजे फक्त रेशमी जरीची साडी नेसवलेली गुढी फक्त! आता या यात्रेत 'मज्जा' गुढीला येते की सहभागी नगरजनांना, तुम्हीच सांगा! अशा या ऐतिहासिक, मराठमोळ्या सारस्वतनगरीत जावयाचे म्हणजे आमच्यासारख्या ठोंब्या लेखकांना केवढे प्रयास पडतात, हे काय सांगावयाचे! एक तर एरवीच मराठी लेखकाकडं नोटांचा अभाव... त्यात नोटाबंदी आल्यानंतरचे प्रसंग काय सांगायचे! 'झाकली मूठ सव्वा हजाराची' ठेवायची झालं... (म्हणीपुरतेही 'लाख' नसतात हो आमच्याकडं!) तरी आमची 'ही' पुष्कळ व्यवहारी आहे. आपला नवरा लेखक, म्हणजे त्याच्या खिशात छदाम नसणार, हे तीस ठाऊक असते. त्यामुळंच आमच्या मुदपाकखान्यातली पितळी भांडी अशा वेळी ब्यांक म्हणून उपयुक्त ठरतात. अशाच एका 'ब्यांके'तले सव्वाशे रुपये हिनं परवा काढून मजकडे दिले. त्यातून भाजी आणायची होती. मात्र, आम्ही चतुर लेखक असल्यानं भाजीचे पैसे वाचवून बसनं साहित्याच्या हेडक्वार्टरी गेलो. टिळक रस्त्यावरच्या त्या महन्मंगल वास्तूत पाऊल टाकताना, छाती भरून येते. (आम्ही ज्या बसनं उतरतो, ती पुढं जाताना हमखास काळाकुट्ट धूर सोडते, त्यामुळं छातीबरोबरच डोळे, कान इ. पंचेंद्रियेही भरून येतात. तर तेही असोच.) मुद्दा असा, की तूर्त साहित्याचे हेडक्वार्टर संत्रानगरीत गेल्यामुळं आम्हास इथं फक्त केळी मिळणार, हे आधीच ठाऊक होते. तरीही कुठे काही सेटिंग होते का हे पाहण्याची खोड काही जात नाही. आम्हाला किमान एक परिसंवाद मिळणं गरजेचं होतं. तसं झाल्यासच 'डोंबिवली फास्ट (आणि फुकट)' ही फिलिम सत्यात उतरणार होती. 'परिसंवाद' या शब्दावर एक अत्यंत जुना आणि पचपचीत पीजे करून आम्ही कार्याध्यक्षांना हसवण्याचा प्रयत्न केला. पण हा माणूस मुलखाचा सभ्य आणि सरळ हो! (सध्याच्या संमेलनाध्यक्षांच्या सहवासात राहूनही हे टिकवणं म्हणजे खायचं काम नव्हे. पण असो, असो, असोच...) तर कार्याध्यक्षांकडं लग्गा लावूनही काही होत नाही, म्हटल्यावर आम्ही निराश होत्साते हेडक्वार्टरीच्या पायऱ्या उतरलो. परिसंवाद नाही तर नाही, किमान एक सूत्रसंचालन, किंवा गेला बाजार एक कविकट्टा मिळाला असता, तरी आमचे भागले असते. ठोंब्याची अपेक्षा फार नसते. इतर लेखकांसारखी आम्हास इतर काही प्रतिभाप्रेरके लागत नाहीत. म्हणजे मिळाली तर नको असतात, असे नाही; पण त्याचा सोस नसतो. वेळ पडल्यास (आणि ती बहुतेकदा पडतेच...) आम्ही दीड केळ्याच्या शिकरणावर दीड हजार शब्दांचा लेख पाडू शकतो. त्यामुळं आमचा सौदा वास्तविक यजमान मंडळींना स्वस्तात पडतो. पण त्यांना ते कळकट शबनमवाले आणि दाढीवाले अनेकोनेक कवीच आवडतात, याला काय म्हणावे! आमचे रूपडे म्हणाल, तर काही राजबिंडे नव्हे, पण 'कवडा' म्हणावे इतके भिकारही नव्हे. आम्ही रोज दाढी-बिढी करतो. कदाचित हीच गोष्ट आमच्या विरोधात जात असावी. यापुढं फेब्रुवारीपर्यंत दाढी राखून पाहावे. नाही तरी सुट्ट्यांच्या वांध्यामुळे कटिंग करणे ही गोष्ट 'कटकटी'चीच झाली आहे. तोपर्यंत कवीचं खपडं रूपडं आलं तर बरंच आहे. यावरून मंडळी, तुमच्या लक्षात एक आलं असेल. संमेलनास फुकटात जाण्यासाठी आम्ही कितीही वेळ खर्च करू शकतो. कारण तो आमच्याकडं भरपूर आहे. आणि टाइम इज मनी... त्यामुळं 'मनी'ही विपुल आहे...! आता तो काळा आहे की पांढरा हे माहिती नाही. कदाचित आम्ही काळ्यावर पांढरे करणारे लेखकू असल्यानं दोन्ही असावा! झाकली मूठ सव्वा हजाराची... आणि झाकली डोंबिवली सव्वा लाखाची! हाय काय अन् नाय काय!! चला, 'डोंबिवली फास्ट' आली... पटकन घुसा...

 ---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, जानेवारी २०१७)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----