29 Sept 2021

मटा दिवाळी अंक २०२० - अनुवाद लेख

अनुवादात इनकमिंग जास्त; आउटगोइंग कमी...
---------------------------------------------------------

मराठीत सध्या अनुवादित साहित्य मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्यामुळं मराठी वाचकांना जगभरातील उत्तमोत्तम साहित्य मराठीत सहज वाचायला उपलब्ध होत आहे. असं असलं, तरी संख्या वाढल्यानं त्याचा दर्जावर परिणाम झाला आहे का? मराठीतून इतर भाषांमध्ये किती साहित्यकृती जातात? अनुवादकांची संख्या, प्रमाण किती आहे? या सर्व प्रश्नांचा नामवंत अनुवादक व प्रकाशकांशी चर्चा करून घेतलेला धांडोळा...

........

मराठी भाषेत विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती होत आली आहे. आता तर हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. मराठीत पूर्वीपासून इतर भाषांमधलं साहित्य अनुवादित होऊन येत आहे. इतर भाषांमध्ये, इतर प्रांतांमध्ये, इतर संस्कृतींमध्ये काय चाललं आहे, हे जाणून घेण्याच्या माणसाच्या मूलभूत जिज्ञासेतून हे सगळं परभाषिक साहित्य आपल्याकडे येत असतं. यात अर्थातच इंग्रजीतून भाषांतरित होऊन येणाऱ्या पुस्तकांचं प्रमाण सर्वाधिक आहे. इंग्रजीत विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती होताना दिसते. ती जागतिक भाषा आहे. त्यामुळं जगातील इतर भाषांमधलं साहित्य इंग्रजीत आधी उपलब्ध होतं. याशिवाय मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषा जाणणाऱ्यांचं विपुल प्रमाण आपल्याकडं आहे. त्यामुळं इंग्रजी पुस्तकं सहज अनुवादित केली जाऊ शकतात. अलीकडच्या काळात अनुवाद मोठ्या प्रमाणावर येताना दिसतात. मराठी भाषेतील अनुवादित साहित्याचं स्थान व महत्त्व एकदम वाढल्यासारखं दिसतं आहे. या तुलनेत मराठीतून इतर भाषांमध्ये किंवा मुख्यत्वे इंग्रजीत किती पुस्तकं भाषांतरित होऊन जातात? मराठी साहित्यव्यवहाराचं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुस्तक व्यवहारांमध्ये काय स्थान आहे, मराठीत होत असलेले अनुवाद संख्येने वाढले असले तरी त्याचा दर्जा योग्य तो राखला जातोय का? या आणि अशा अनेक प्रश्नांचा ऊहापोह करण्यासाठी काही नामवंत प्रकाशक व अनुवादकांशी प्रस्तुत लेखकानं चर्चा केली. त्यातून काहीएक चित्र समोर आलं. ते मांडण्याचा प्रयत्न म्हणजे हा लेख.
मराठीत मोठ्या प्रमाणावर होत असलेले अनुवाद ही स्वागतार्ह गोष्ट असली, तरी त्या अनुवादांचा दर्जा राखणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. याशिवाय मराठीतून इतर भाषांमध्ये साहित्य अनुवादित होऊन जाण्यासाठी प्रकाशकांनी पुढाकार घेणं; तसंच लेखकांनी स्वत:ची व्यावसायिक माहिती अद्ययावत ठेवणं, प्रकाशक-लेखकांनी देशभरात फिरणं, इतर भाषांतील साहित्यधुरिणांना भेटणं या गोष्टी सातत्यानं घडत राहायला हव्यात, असा या चर्चेचा एकूण सूर होता. मराठीत दर्जेदार वाङ्मयाची कमतरता नाही येथपासून मराठीत नव्या पिढीत आश्वासक लेखक दिसत नाहीत इथपर्यंत मतं नोंदविली गेली. अनुवाद ही एक गांभीर्यानं करण्याची बाब असून, अनुवादकाला त्या भाषांचं ज्ञान तर हवंच; याखेरीज त्याला दोन्ही संस्कृतींची सखोल माहितीही हवी, हे निरीक्षणही या चर्चेत मांडण्यात आलं.

अनुवादकाला वेगळ्या प्रज्ञेची गरज

मराठी व कन्नड या भाषाभगिनींना जोडणारे अनेक घटक व व्यक्ती आहेत. यात विठ्ठलापासून ते पं. भीमसेन जोशींपर्यंत अनेक उदाहरणे सांगता येतील. याच यादीत अनुवादाच्या क्षेत्रात अतिशय आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे उमा विरुपाक्ष कुलकर्णी. उमाताई कित्येक वर्षांपासून कन्नड पुस्तकं मराठीत अनुवादित करीत आल्या आहेत. या क्षेत्रातला त्यांचा अभ्यास, व्यासंग दांडगा आहे. मराठीतल्या सध्याच्या अनुवाद व्यवहाराबद्दल बोलताना उमाताई म्हणाल्या, “कन्नडमधील साहित्य जसं मराठीत येतं, तसंच मराठीतलंही बरंच साहित्य कन्नड भाषेत भाषांतरित झालं आहे. चंद्रकांत पोकळे यांनीच जवळपास शंभर पुस्तकं कन्नडमध्ये भाषांतरित केली आहेत. विरुपाक्ष कुलकर्णी यांनीही किमान २५ ते २७ पुस्तकं मराठीतून कन्नडमध्ये आणली आहेत. असं असलं, तरी इतर भाषांमधून मराठीत ज्या प्रमाणात अनुवादित साहित्य येतं, त्या प्रमाणात मराठीतून अन्य भाषांमध्ये जाणारं साहित्य तुलनेत कमी आहे. याचं एक कारण असं वाटतं, की आपल्या लेखकांची त्या प्रमाणात चर्चा तिकडं होताना दिसत नाही. आपल्याला भैरप्पा, शिवराम कारंत किंवा गिरीश कार्नाड ही नावं माहिती असतात. त्यांचं काम माहिती असतं. त्या तुलनेत आपल्याकडचे लेखक कमी माहिती असतात. अनिल अवचटांसारख्या लेखकाची केवळ एक किंवा दोनच पुस्तकं त्या भाषेत अनुवादित झाली असतील, तर तिथल्या वाचकांना हा लेखक कसा समजणार? त्याची चर्चा कशी होणार? लेखक हा हिंडता-फिरता पाहिजे. आपल्या लेखकांनी बेंगळुरू, म्हैसुरूमध्ये जायला पाहिजे. त्यांच्या पुस्तकांची प्रकाशनं त्या शहरांमध्ये व्हायला पाहिजेत. तिथल्या लोकांशी, साहित्यिकांशी त्यानं संवाद साधला पाहिजे. असं केलं तर लोकांना त्या लेखकाविषयी कुतूहल निर्माण होईल. त्याच्या पुस्तकांना मागणी वाढेल.”
“मराठीतल्या महत्त्वाच्या प्रवाहांबाबत इतर भाषांमध्ये जरूर कुतूहल होतं आणि आहे,” असं सांगून उमाताईंनी दलित साहित्याचं उदाहरण दिलं. त्या म्हणाल्या, “मराठीत साठोत्तरी काळात दलित साहित्य, स्त्री साहित्य, ग्रामीण साहित्य असे वेगवान प्रवाह निर्माण झाले. त्याबाबत कन्नड साहित्यिकांमध्ये किंवा तिथल्या साहित्य वर्तुळात जरूर चर्चा होत असे. कुतूहल वाटत असे. मात्र, पुढच्या काळात हे कुतूहल टिकवण्याचं किंवा शमवण्याचं काम त्या ताकदीनं करण्यात आपल्याकडचा साहित्यप्रवाह कमी पडला, असं दिसून येतं. आपल्याकडची पुस्तकं तिकडं मोठ्या प्रमाणात अनुवादित होऊन का जात नाहीत, तर मुळात याचं उत्तर असं आहे, की अनुवाद हे वेळखाऊ काम आहे. मीही सुमारे २५ ते ३० लेखकांचं साहित्य अनुवादित केलं आहे. त्यातले काही लेखकच वाचकांपर्यंत पोचले आहेत. याचाही विचार करायला हवा. वेळेचं म्हणून एक ‘अर्थकारण’ असतं. त्यात हे अनुवादाचं काम बसत नाही. मी काही अनुवादाच्या कामावर अवलंबून नाही. माझ्या आनंदासाठी मी हे काम करते. त्यासाठी पुष्कळ वेळ देते. ज्या लेखकाचं पुस्तक अनुवादित करायचंय त्याला त्याच्या शहरात जाऊन किमान एकदा तरी भेटते. त्याचं घर, परिसर, पर्यावरण सगळं पाहते. तो बोलतो कसा, वावरतो कसा याचं निरीक्षण करते. त्यातून प्रवाही अनुवाद करायला मदतच होते. आता एवढा वेळ कुणी देत नाही. खरं तर अनुवाद ही दोघांनी करायची गोष्ट आहे. माझं बरंचसं काम विरुपाक्ष आणि मी, दोघांनी मिळून केलंय. आपल्याकडेही पूर्वी दोघांनी मिळून अनुवाद केल्याची उदाहरणं आहेत. खरं तर आता एवढी सांस्कृतिक घुसळण होते आहे. लोक या प्रांतातून त्या प्रांतात सहजी जातात. आपल्याकडे कॉस्मोपॉलिटन शहरांत तुमच्या शेजारी आपल्या देशातील कुठल्याही प्रांताचा माणूस राहायला येऊ शकतो. त्याच्याशी मैत्री केली तर आणखी एक भाषा आपल्याला समजू शकते. आपल्याकडे अनेक अभ्यासू माणसं आहेत. दोन मैत्रिणींनी दुपारच्या मोकळ्या वेळात एकत्र येऊन अनुवादाचं काम केलं तर काहीच हरकत नाही. पण हे होताना दिसत नाही. अनुवाद वाचणारा फार सहनशील वाचक असतो. मुळात त्याला त्या परक्या भाषेतील साहित्याविषयी काही तरी कुतूहल असतं, म्हणून तर तो ते पुस्तक आणतो. तेव्हा त्याला समाधान मिळेल असं काम तुम्हाला करता आलं पाहिजे. आपल्याकडचं दलित साहित्य सगळीकडं पोचलंय. याचं कारण तेव्हाच्या प्रचलित साहित्यापेक्षा वेगळा काही आशय देण्याचं काम त्यानं केलं. आताचे लेखक असं काही वेगळं देत आहेत का? वाचकांची भूक भागेल असा आशय पुरवत आहेत का? आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्या साहित्यातून मांडत आहेत का? मराठवाड्यातून खूप चांगले नवे साहित्यिक येत आहेत. शेतकरी आत्महत्या ही आपल्याकडची मोठी समस्या आहे. त्यावर खूप वेळ घेऊन, संशोधन करून काही लिहिलं गेलंय का? तसं साहित्य निर्माण झालं तर ते इतर भाषांतले लोकही आवर्जून वाचतील. याखेरीज आपल्याकडचे प्रस्थापित लेखक स्वत: आपल्या साहित्यकृती अन्य भाषांत जाव्यात म्हणून किती प्रयत्नशील असतात? तुम्ही तुमच्या अनुवादकांना कसं वागवता, यावरही खूप काही असतं. अनुवादकाला तो मान मिळायला नको का? अनुवादकाला वेगळ्या प्रकारची प्रज्ञा गरजेची असते. हे खूप गांभीर्यानं, अभ्यास करून, वेळ देऊन करायचं काम आहे.”
“आपल्याकडं एकोणिसाव्या शतकात प्रथम अनुवादाचं एक युग येऊन गेलं. तेव्हा अनुवाद हा शब्दही नव्हता. भाषांतर म्हणत असत. परदेशी साहित्यकृतींना मायबोलीचं सौष्ठव देण्याचं काम या काळात झालं. तेव्हा ती त्या काळाची गरज होती. आता स्वातंत्र्योत्तर काळात अनुवाद ही साहित्यिक गरजेपेक्षा वैयक्तिक गरजेची गोष्ट झाली आहे. मुळात वाचकांची संख्या वाढली आहे. त्यामुळं त्यांच्यात वैविध्य आलंय. त्याला आता केवळ फिक्शन किंवा ललितकला नको आहे. त्याला माहितीपर पुस्तकं हवीत, त्याला पर्यटनावरची पुस्तकं हवीत. स्व-मदत प्रकारातली पुस्तकं हवीत. कालांतरानं ही गरजदेखील कमी होत जाईल,” असं निरीक्षणही उमाताईंनी नोंदवलं.

‘आंतरभारती’चं स्वप्न अधुरंच 

पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे म्हणाले, “आपल्याकडे मुद्रणतंत्र आल्यावर प्रकाशन व्यवहाराचा प्रारंभीचा काळ हा 'अनुवाद पर्व' म्हणावा असाच होता. ब्रिटिश राजवटीच्या प्रभावातून इंग्रजी साहित्य व पुस्तके मराठीत येऊ लागली. याचा अर्थ असा नव्हे, की ही प्रेरणा आपण इंग्रजांकडून घेतली. आपल्याकडे सातव्या व आठव्या शतकापासूनच अनुवाद प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्ञानेश्वरपूर्व काळ आणि नंतरचा म्हणजे बाराव्या शतकानंतर आपणाकडे जास्ती अनुवाद संस्कृतमधून आले. प्राकृत, पाली अशा भाषा त्या वेळीही होत्या. ज्यात भारतीय ज्ञानशाखांचा अभ्यास होत होता. इंग्रजीच्या अगोदर संस्कृतमधून खूप भाषांतरे, अनुवाद, आधारित साहित्य मराठीत आले आहे. मराठीत अनेक नाटकं, काव्यरचना संस्कृतमधून आल्या. मराठीच्या व्याकरणावरही संस्कृत भाषेची मोठी छाप आहे. आपणाकडे व्याकरण, भाषाशास्त्र, साहित्यशास्त्र, काव्यशास्त्र संस्कृतमधून अनुवादित होत गेले व त्यात पुढे कालमानानुसार बदल होत गेले. ब्रिटिशांच्या प्रभावामुळे जे अनुवाद व ग्रंथ भारतीय भाषांत आले त्यावर इंग्रजी साहित्याचा व भाषेचा प्रभाव होता. इंग्रजीव्यतिरिक्त अन्य जागतिक भाषांतील साहित्य मराठीत यायला काही काळ लागला. विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळात आपण रशियन, फ्रेंच व इतर अन्य भाषांतील श्रेष्ठ साहित्यकारांचे अनुवाद आपल्याकडे येऊ लागले. ब्रिटिशांच्या प्रभावात आपणास फक्त शेक्सपिअर श्रेष्ठ वाटत होता; पण पुढे टॉलस्टॉय, दोस्तोव्हस्की, काफ्का, सार्त्र, आल्बेर काम्यू अशा किती तरी श्रेष्ठ लेखकांचा परिचय आपणास होऊ लागला.”
मराठीतून इतर भाषांत कितपत अनुवाद जातात, यावर जाखडे म्हणाले, “हे प्रमाण खूप कमी आहे. परंतु 'नॅशनल बुक ट्रस्ट व साहित्य अकादमीमुळे मराठीतील अनेक पुस्तके इतर भारतीय भाषांत अनुवादित झाली. जगभरातील इतर भाषांत झालेल्या अनुवादित पुस्तकांची संख्या फार कमी आहे. इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश भाषांत काही पुस्तके अनुवादित झाल्याचे दिसते. अर्थातच इंग्रजीत ही संख्या थोडी जास्त भरेल. साधारणत: १५०० ते २००० पर्यंत ही संख्या जाऊ शकेल. मुळात इतर भाषांमधील प्रकाशकांनी आपल्या साहित्यकृतीमध्ये रुची दाखवायला हवी. आपण इतर भाषांमधल्या साहित्यकृतीचे हक्क विकत घेतो, त्यांच्या अटी-शर्ती स्वीकारतो. वास्तविक ही देवाण-घेवाण दोन्ही बाजूंनी व्हायला हवी. भारतीय भाषांतील साहित्य अधिक प्रमाणात यायला हवे. ‘आंतरभारती’ ही संकल्पना मुळात तीच होती. मात्र, ते स्वप्न अपूर्णच राहिलं. त्यातल्या त्यात बंगाली किंवा कन्नड या भाषांसोबतचा आपला साहित्यव्यवहार अधिक राहिला आहे. आम्ही ‘उत्तम अनुवाद’ या आमच्या अंकामधून तोच प्रयत्न करीत आहोत. या भाषांव्यतिरिक्त इतर भाषांमधलं साहित्य आम्ही मराठीत आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. भारतीय व इतर जागतिक भाषांतील पुस्तके मूळ भाषेतून येण्याऐवजी इंग्रजीमार्फत जास्त येतात, ही गोष्ट खटकते. आज अनुवादाची पुस्तके जास्त प्रमाणात प्रत्याशित होत आहेत. परंतु ती अभिजात साहित्याची होत नसून लोकप्रिय पुस्तके अनुवादित होत आहेत. ही वाढ नसून सूज आहे. वैचारिक साहित्याचे अनुवाद आपल्याकडे फार कमी येत आहेत. यामुळे वाङ्मयीन अभिरुचीला पोषक असे काही घडत नाही. विक्री हेच उद्दिष्ट समोर ठेवून पुस्तक मराठीत येत आहेत.”
आपल्याकडचे साहित्य कमी प्रमाणात अनुवादित होऊन बाहेर जाते, याबाबत बोलताना जाखडे म्हणाले, “अनुवादकांची उणीव हे एक महत्त्वाचे कारण आहे. आपल्या शेजारच्या राज्यातील वाङ्मय व सांस्कृतिक व्यवहार आपणास समजत नाहीत, ही गोष्ट चांगली नाही. त्या-त्या राज्यात राहणाऱ्या मराठी माणसांनी सांस्कृतिक दूत बनणे गरजेचे आहे. सर्व विद्यापीठांतील इंग्रजी प्राध्यापकांची जबाबदारी मोठी आहे. परंतु इतर भाषांतील समीक्षा, संशोधन व इतर ज्ञानशाखातील पुस्तकांचे अनुवाद होत नाहीत व आपलेही इतर भाषांत फारसे जात नाही. सध्या उथळ गोष्टींना प्रतिष्ठा देण्याचे षडयंत्र प्रभावी आहे. आज मायथॉलॉजीवरची बरीच लोकप्रिय पुस्तके मराठीत अनुवादित केली जात आहेत. आपल्याकडे डॉ. रा. चिं. ढेरे यांनी आयुष्यभर याच विषयावर प्रचंड काम केले; परंतु सर्वसाधारण संकलन करून अनेक देव-दैवत विज्ञानावरची किरकोळ रंजक पुस्तके आपण विकत घेत आहोत, अनुवादित करीत आहोत. मूळ मराठीतही खूप मोठे काम झाले आहे. हे लक्षात घेऊन बाहेरचे तेवढे श्रेष्ठ हा समज आपण काढून टाकला पाहिजे.”
इतर भाषांतील पुस्तके अनुवादित करताना स्थानिक प्रतिभेला धक्का बसणार नाही व आपल्या भाषेतील साहित्यकारांचा आत्मविश्वास जाणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे, असं मत जाखडे यांनी मांडलं.

प्रकाशकांचा पुढाकार कमी

‘राजहंस प्रकाशना’चे दिलीप माजगावकर म्हणाले, “मराठीतून अन्य भाषांत अनुवाद होऊन जाण्याचं प्रमाण कमी आहे. आम्ही प्रकाशक मंडळी त्याबाबत जेवढे जागरूक असायला हवे आहोत, तेवढे जागरूक नाही आहोत, असा माझा स्वत:वरून अनुभव आहे. आम्ही व्यक्तिगत पातळीवर आमच्या पुस्तकांची जशी विक्री करतो, तशी व्यवस्था करतो तसं अनुवादित पुस्तकं हेही विक्रीचं एक साधन आहे, हे आम्ही लक्षात घेत नाही. वास्तविक हे लेखक व प्रकाशक या दोघांच्याही हिताचं आहे. मराठीत ‘मसाप’सारखी संस्था असेल किंवा सरकारच्या पातळीवर साहित्य संस्कृती मंडळासारखी संस्था असेल, तशा इतर प्रादेशिक भाषांमध्ये त्यांच्या त्यांच्या संस्था निश्चितच असणार. बंगळुरूमध्ये तर कन्नड भाषेची संस्था आहेच. अशा संस्थांशी संपर्क साधणं, त्यांच्याशी देवाणघेवाण करणं अशा गोष्टी आमच्याकडून केल्या जात नाहीत. त्यासाठी आम्ही आमच्या पुस्तकांची माहिती अगदी प्रादेशिक भाषांमधून नाही, तरी निदान इंग्रजीतून तरी त्याची माहितीपत्रकं तयार करून, त्या त्या संस्थांपर्यंत पोचवायला हवी. तिथल्या माणसांशी संपर्क साधून त्यांना हे सांगायला हवं. केरळमधल्या माणसाला मराठीत काय नवं साहित्य आलं आहे, हे माहितीच नसतं. सर्व प्रकाशकांनी हे करायला हवं. इंग्रजी प्रकाशन संस्थांत मराठी माणसं संपादक म्हणून करीत असतील तर त्यांना मराठीतील दर्जेदार साहित्यनिर्मितीविषयी माहिती असतं. इंग्रजी व मराठीत त्या पद्धतीनं देवाणघेवाण होऊ शकते. गुजराती किंवा कन्नड भाषांमधूनही अशी देवाणघेवाण थोड्या प्रमाणात होते. भविष्यात मराठीतून मोठ्या प्रमाणात अन्य भाषांत अनुवाद होऊन पुस्तकं जाऊ शकतील, एवढी उत्तम निर्मिती मराठीत होत असते.”
मराठीत सध्या येत असलेल्या भारंभार अनुवादामुळे दर्जावर परिणाम होतो का, या प्रश्नावर बोलताना माजगावकर म्हणाले, “निश्चितच दर्जावर परिणाम होतो. आता शब्दाला शब्द अशा पद्धतीचं भाषांतर वाचकाला फार रुचत नाही. अनुवाद ही एक वेगळी कला आहे, ते एक वेगळं शास्त्र आहे. अनुवाद करणाऱ्याला दोन्ही भाषा नीट माहिती असायला हव्यात. केवळ कथानकाचा गोषवारा असं रूप त्या अनुवादाला येत असेल, तर आपल्या चिकित्सक वाचकाला ते लगेच लक्षात येतं. मग वाचक अशा अनुवादाला हातच लावत नाहीत. म्हणूनच मोठ्या प्रमाणावर अनुवाद येत असूनही त्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत नाही. सगळ्याच पुस्तकांचा अनुवाद दर्जेदार असतो असं नाही. घाई केली, की संख्यात्मक फायदा मिळाला, तरी दर्जात्मक फायदा मिळतोच असं नाही. त्याच्यावर परिणाम होतोच. त्यासाठी प्रकाशन संस्थांमध्ये वेगळा संपादक असणं आवश्यक असतं. सगळ्याच प्रकाशन संस्थांमध्ये अशी व्यवस्था असतेच असं नाही. मात्र, तशी गरज असते. छोट्या प्रकाशन संस्थांना हा सेटअप परवडत नाही. त्यामु‌ळे दर्जावर परिणाम होणं अपरिहार्य असतंच.”
“अनुवादात मराठीत चरित्रं-आत्मचरित्रं, व्यक्तिमत्त्व विकास, प्रेरणादायी वाङ्मय, आरोग्य किंवा उपयोजित विषय यांना मागणी असल्याचं दिसतं. फार कमी प्रमाणात कथा-कादंबऱ्यांना प्रतिसाद मिळतो, असं दिसतो. भैरप्पांसारखा लेखक अपवाद! कथा-कादंबऱ्यांना मराठी अनुवादातच नव्हे, तर मूळ मराठी साहित्यातही सध्या कमी मागणी दिसते. कथेला तर नाहीच, असा ‘राजहंस’चा अनुभव आहे. इतर प्रकाशकांचा अनुभव कदाचित वेगळा असू शकेल. ते साहित्यप्रकार वाचण्याचं प्रमाण कमी होताना दिसतं आहे. किंबहुना कथा दिवाळी अंक किंवा मासिकातच वाचाव्यात, असं वाचकांनी ठरवलेलं दिसतं. त्यासाठी दोन-तीनशे रुपये खर्च करून पुस्तक घेण्याची त्यांची फारशी तयारी नसते,” असं निरीक्षण माजगावकर यांनी नोंदवलं.

व्यावसायिक तयारीचा अभाव

‘मेहता प्रकाशन’चे सुनील मेहता म्हणाले, “मराठीत इंग्रजीतूनच सर्वाधिक अनुवाद येतात. इंग्रजीव्यतिरिक्त फ्रेंच, जर्मन किंवा इतर भारतीय प्रादेशिक भाषांमधून थेट मराठीत अनुवाद फारसे होत नाहीत. होत असलेच तरी त्याचे प्रमाण एक टक्काही नाही. इतर भाषांमधून असे साहित्य मराठीत आणण्यासाठी मुळात प्रकाशकांकडे ती जाण असायला हवी. हे प्रकाशकांचंच काम आहे. मराठीतूनही इतर भाषांमध्ये अनुवाद होण्याचे प्रमाण फार कमी आहे. लेखक व प्रकाशक यांच्याकडे व्यावसायिकता हवी. आपल्या साहित्यकृतीचं इंग्लिशमधून सिनॉप्सिस तयार हवं. लेखकाचा इंग्रजीतील परिचय तयार हवा. विक्रीचे आकडे माहिती हवेत. आपल्या साहित्यकृतीच्या काही भागांचं भाषांतर करून तयार ठेवलं पाहिजे. एखाद्याला मराठीतून फ्रेंचमध्ये अनुवाद करून हवा असेल, तर फ्रेंचमध्ये भाषांतर करून देण्याची आपली तयारी हवी. हे काम एकट्या-दुकट्या प्रकाशकाचं नाही. भाषा मंत्रालयाचा साहित्य-संस्कृती विभाग, साहित्य महामंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, प्रकाशक परिषद अशा संस्थांनी मोठ्या प्रमाणात हे काम हाती घेतलं पाहिजे. मुळात इतर भाषक साहित्यिकांसोबत देवाणघेवाण व्हायला हवी. त्यांना आपल्या साहित्य संमेलनांना आमंत्रित करायला हवे. आपल्याकडे त्या वर्षी आलेल्या महत्त्वाच्या पुस्तकांचा, पुरस्कार विजेत्या पुस्तकांचा कॅटलॉग तयार हवा. संमेलनांत अशा पुस्तकांची जाहिरात व्हायला हवी. वर्षातून तीन ते चार वेळा हे आदान-प्रदान झालं पाहिजे. केवळ लेखक-साहित्यिकच नव्हे, तर सामान्य माणसांकडंही सांगण्यासारखं बरंच काही असतं. त्यांच्याकडून लिहून घेतलं पाहिजे. त्याचं संकलन केलं पाहिजे. प्रकाशकांनीही फिरलं पाहिजे. फ्रँकफर्टसारख्या जागतिक बुक फेअरला भेट दिली पाहिजे. जागतिक साहित्य व्यवहाराकडे डोळसपणे पाहिलं पाहिजे. तिथल्या घटना-घडामोडी, ट्रेंड जाणून घेतले पाहिजेत. आता मल्टिमीडिया पुस्तकांचाही ट्रेंड येऊ घातला आहे. आपल्याला याची जाण पाहिजे. आपल्या वाचकांच्या संदर्भात काय करता येईल, याचा विचार करत राहिलं पाहिजे.”
अनुवादाचे प्रमाण भरमसाठ वाढल्याने त्याचा दर्जावर परिणाम झाला आहे का, या प्रश्नावर मेहता म्हणाले, “दर्जावर परिणाम झालेला नाही. उलट मोठ्या प्रमाणात अन्य भाषांमधले साहित्य मराठीत आले. प्रकाशक अनुवादावर किती मेहनत घेतात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. अलीकडच्या काळात स्व-मदत प्रकारच्या पुस्तकांची व त्यांच्या अनुवादाची लाटच आली. आयटी इंडस्ट्रीनं हा ट्रेंड आणला. आताच्या वाचकांना सर्व प्रकारचं साहित्य वाचायला हवं असतं. त्यामुळं अनुवाद वाढले. महाराष्ट्रात वाचनसंस्कृती उत्तम आहे, वाढते आहे. उलट ग्रामीण भागात खोलवर प्रकाशक पोचू शकत नाहीत. तिथल्या वाचकांपर्यंत आपण पुस्तकं पोचवू शकलो, तरी खप किती तरी प्रमाणात वाढेल. इतर भाषांमधील साहित्य मराठीत आणताना केवळ व्यावसायिक विचार करून चालणार नाही. आपल्याकडे फारशा येत नसलेल्या उडिया भाषेतील साहित्यही आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आम्ही जाणीवपूर्वक असं काम करतो. अर्थात यासाठी अनुवादकांची नवी, चांगली फळी तयार होणं अत्यंत गरजेचं आहे. इतर भाषांमधून मराठीत अनुवाद कमी होतात, त्याला दोन्ही भाषांची जाण असणाऱ्या अनुवादांचा अभाव हेही एक कारण आहे. इंग्रजी अनुवादकांच्या तुलनेत इतर जागतिक भाषांतील अनुवादकांचे प्रमाण कमी आहे. असे अनुवादक उपलब्ध असतील तर त्यांची एखादी यादी प्रकाशनाकडे असायला हवी.”

आजचा वाचक ‘डिमांडिंग’

मंजुल प्रकाशनाचे चेतन कोळी म्हणाले, “मराठीत सध्या अनुवादित पुस्तके येण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे, यात शंका नाही. यात अर्थातच इंग्रजी भाषेतून सर्वाधिक अनुवाद होतात. त्यानिमित्ताने त्या भाषेतले ‘बेस्ट सेलर’ लेखक मराठीत येतात. ‘अमेझॉन’सारख्या बड्या कंपन्या ठरावीक काळाने त्यांच्या साइटवर वेगवेगळ्या याद्या प्रसिद्ध करीत असतात. त्यात जागतिक पातळीवरून ते अगदी प्रादेशिक पातळीवरील पुस्तकांमधील सर्वोत्कृष्ट खपाचे लेखक कोण, हे प्रदर्शित केलं जातं. जगभरातले प्रकाशक या याद्यांवर लक्ष ठेवून असतात. अनेक वाचकही नियमित या याद्या वाचत असतात. अनेकदा तर वाचकच विशिष्ट पुस्तक प्रकाशकांकडे आणून, हे पुस्तक लवकर मराठीत येऊ द्या, असा आग्रह धरतात. निखळ व्यावसायिक अंगानेच बोलायचं झालं तर मराठी साहित्य व्यवहार या अनुवादित पुस्तकांमुळेच तरलाय, असे म्हटले तर वावगे ठरू नये. मराठीत काही कायमस्वरूपी लोकप्रिय पुस्तके आहेत. उदा. मृत्युंजय! कितीही बिकट काळ असो, अगदी आत्ताचा करोनाचा वाईट कालखंड असो, ही पुस्तके कायम खपत असतात. त्यातून प्रकाशन व्यवसायाला ऊर्जा मिळत असते. हल्लीचा वाचक खूप डोळसपणे, सजगपणे वाचणारा आहे. त्याच्याकडे तंत्रज्ञान आहे, सोशल मीडिया आहे. त्यामुळे जगभरातल्या घडामोडी त्याला सहजच कळत असतात. आजचा वाचक खूप ‘डिमांडिंग’ आहे. त्यामुळे अनुवादित पुस्तके त्याची भूक भागविण्यासाठी आवश्यक आहेत आणि म्हणूनच त्यांचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे.”
अनुवादित पुस्तकांमध्ये कुठल्या प्रकारच्या पुस्तकांना मागणी आहे, याबाबतची आपली निरीक्षणे सांगताना कोळी म्हणाले, “कथा-कादंबऱ्या अशा कल्पित लेखनापेक्षा नॉन-फिक्शन प्रकारातील लेखनाला मराठी वाचकांची मागणी अधिक आहे. सेल्फ-हेल्प गटातील पुस्तके सर्वाधिक खपतात, हे सांगायला नकोच. याशिवाय बिझनेस मॅनेजमेंट, विविध उद्योगपतींची आत्मचरित्रं, लोकप्रिय विज्ञान, युवाल नोआ हरारी यांच्यासारख्या लेखकांची पुस्तकं यांना मोठी मागणी आहे. मराठी माणसांना एकूणच चरित्रं, आत्मचरित्रं वाचायला आवडतात. मराठीतील पुस्तके अन्य भाषांमध्ये अनुवादित होण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. याचे कारण, इतर भाषिक वाचकांना रुची निर्माण होईल, असे साहित्य आधी आपल्याकडे निर्माण व्हावे लागते. त्यानंतर त्यांचा उत्तम अनुवाद व्हावा लागतो. आता ‘मृत्युजय’ ही कर्णाच्या जीवनावरची कादंबरी असल्याने तिला सर्व भारतात वाचक लाभू शकतो. या कादंबरीचे मुख्य भारतीय भाषांत अनुवाद झाले आहेत. मात्र, बहुतेक वेळा हे अनुवाद इंग्रजी अनुवादावरून करण्यात आले आहेत. तमीळ किंवा तेलगूत हे काम करण्यासाठी मराठी व तमीळ किंवा मराठी व तेलगू अशा दोन्ही भाषा तितक्याच सफाईने जाणणारे अनुवादक मिळणे अवघड आहे. अनेकदा काहींना भाषा येत असते, मात्र अनुवादाचे कौशल्य नसते. अनेक जण तंत्रस्नेही नसतात. प्रकाशकांना वेगाने काम करणारे अनुवादक हवे असतात. तेही कौशल्य अनेकांकडे दिसत नाही. त्यामुळं हे अनुवाद इंग्रजीवरूनच करावे लागतात. काही काही पुस्तकं उत्तम असतात. मात्र, अन्य भाषांमध्ये त्यांचा संदर्भ कसा लावावा, असा प्रश्न पडतो. उदा. माडगूळकरांची ‘बनगरवाडी’ ही कादंबरी उत्कृष्ट आहे, यात वादच नाही. मात्र, उद्या तिचा बंगाली किंवा पंजाबीत अनुवाद करायचा झाला, तर किती अडचणी येतील, कल्पना करून पाहा. त्यातले त्या काळाचे, त्या समाजाचे, त्या भौगोलिक पर्यावरणाचे संदर्भ आपण कसे काय अनुवादित करणार आहोत? याउलट ‘पानिपत’सारखी कादंबरी देशभरात वाचली जाऊ शकते, कारण देशभरातील वाचकांना पानिपतची लढाई या ना त्या प्रकारे नक्की माहिती असते. आता तर त्या विषयावर हिंदी सिनेमाही आला आहे. त्यानंतर अशा कादंबऱ्यांचं अनुवाद येतात आणि त्यांचं चांगले स्वागतही होतं, असा अनुभव आहे. आम्ही अलीकडंच विजय आनंद यांच्यावरचं मूळ मराठीतलं चरित्रात्मक पुस्तक हिंदीत आणलं. विजय आनंद हे मोठे दिग्दर्शक होते, पण हिंदीत किंवा इंग्रजीत त्यांचं एकही चरित्र नाही, असं लक्षात आलं. मग मराठी चरित्राचा अनुवाद केला आणि त्याचं त्या भाषेत चांगलं स्वागत झालं. नरेंद्र दाभोलकर यांचं कामही असंच भाषेपलीकडचं आहे. त्यामुळं त्यांची अंधश्रद्धा निर्मूलनावरची अनेक पुस्तकं हिंदीत आली आहेत. याखेरीज आपण मराठी लोक राष्ट्रीय स्तरावर थोडे बिचकतो, असा अनुभव आहे. अनेक नव्या, तरुण लेखकांना राष्ट्रीय स्तरावरच्या योजना, पारितोषिके, संस्था यांची माहितीच नसते किंवा तिकडं आपली पुस्तकं पाठवण्यात ते हलगर्जी करतात. युवा साहित्य अकादमीचे पुरस्कार असतात. आपल्याकडच्या लेखकांना त्यासाठी अर्ज करा, असं सांगावं लागतं. लेखकाकडं स्वत:ची नीट माहिती असली पाहिजे, अपडेट बायोडेटा असला पाहिजे. या आणि अशा अनेक गोष्टी व्यावसायिक सफाईनं केल्या पाहिजेत. मात्र, आपण मराठी माणसं यात कमी पडतो. याला अर्थातच अपवाद आहेत. मराठीत नव्या पिढीत चांगल्या अनुवादकांची संख्याही फार कमी आहे. तरुण मुलांनी या क्षेत्राकडं यायला हवं. अनुवाद म्हणजे अनुसर्जन! त्याकडं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे, तरच चांगले अनुवादक तयार होतील आणि भाषांमधली ही देवाणघेवाण अधिक सर्जनशील व प्रभावी ठरेल, असं वाटतं.”

'सशक्त आशय मिळतो का?'

‘रोहन प्रकाशन’चे प्रदीप चंपानेरकर म्हणाले, “इतर भाषांतून मराठी भाषेत अनुवादित पुस्तकांचं प्रमाण गेल्या वर्ष-दीड वर्षांत थोडं कमी झालेलं जाणवत असलं, तरी मध्यंतरीच्या काळात हे प्रमाण खूपच वाढलं होतं. मात्र, त्याच्या काही अंशानेही मराठी पुस्तकं इंग्रजी किंवा इतर भाषांत अनुवादित होत नाहीत. आजवर काही लोकप्रिय कादंबऱ्या जरूर प्रसिद्ध झाल्या आहेत, विशेषत: ऐतिहासिक! परंतु गेल्या एक-दोन दशकांतली किती पुस्तकं इतर भाषांत गेली आहेत? सार्वकालीन, सर्वसमावेशक असा सशक्त आशय आपण देतो का, हाही प्रश्न आहेच. त्याचप्रमाणे दोन्ही, तिन्ही भाषांवर प्रभुत्व असलेले किती अनुवादक आहेत? ही प्रॅक्टिकल अडचण आहे. त्याचप्रमाणे संशोधनात्मक साहित्य निर्माण करायचं म्हणजे आर्थिक प्रश्न निर्माण होतात. मी १७-१८ वर्षांपूर्वी विजय तेंडुलकरांना सरदार पटेलांचं चरित्र लिहिण्याचं सुचवलं. तेव्हा ते म्हणाले, की त्यासाठीचा संशोधनाचा खर्च एका मराठी आवृत्तीला कसा झेपेल? चार-पाच भाषांत त्याचा अनुवाद व्हायला लागेल. परंतु असे ‘पार्टनर्स’ मी मिळवू शकलो नाही. नंतर इंग्रजीतलं बलराज कृष्ण लिखित पटेलांचं चरित्र मी मराठीत अनुवादित करून घेतलं. ‘यांनी घडवलं सहस्रक’, ‘असा घडला भारत’ हे संशोधनात्मक ग्रंथ मी स्वबळावर साकारले. वेळ आणि पैसे भरपूर खर्चले. परंतु दोन्ही ग्रंथ मी इतर भाषांत नेऊ शकलो नाही. त्याचं कारण सक्षम अनुवादकांची वानवा. (म्हणजे उलटा अनुवाद उदा. मराठी ते इंग्रजी!) आर्थिक कारणांसोबतच मराठी माणसाची मानसिकताही कारणीभूत आहे. तो बाहेरच्या राज्यांत पोचत नाही, फिरत नाही; संपर्क वाढवत नाही. तेव्हा आपलं साहित्य बाहेरच्या जगात जाण्यास अंगभूत मर्यादा पडतात.”

'मूळ साहित्यकृतीशी प्रामाणिक राहायला हवं'

गेली ३३ वर्षे अनुवादाचं काम करणाऱ्या ज्येष्ठ अनुवादक लीना सोहोनी यांनी, अनुवाद करताना अनुवादकाला कोणते कष्ट करावे लागतात, उत्तम अनुवादासाठी काय काय प्रयत्न आवर्जून करावे लागतात, याविषयी सांगितलं. त्या म्हणाल्या, “मराठीत इंग्रजी भाषेतून सर्वाधिक अनुवाद केले जातात. पूर्वी मराठी माध्यमांत शिकलेल्या सगळ्या मुलांचं मराठी व इंग्रजी दोन्ही उत्तम असायचं. त्यामुळं इंग्रजीतून मराठीत अनुवाद करणारे भरपूर अनुवादक मिळू शकतात. एखाद्या साहित्यकृतीचा अनुवाद उत्तम व्हायचा असेल, तर मुळात त्या साहित्यकृतीशी प्रामाणिक राहता आलं पाहिजे. काहीही गाळायचं नाही आणि स्वत:ची काहीही भर घालायची नाही, हे तत्त्व पाळावं लागतं. आपली भाषा, लेखन कितीही उत्तम असलं, तरी अनुवादात स्वत:ची शैली आणण्याचा प्रयत्न करणं टाळलं पाहिजे. अनुवादकाला स्वत:ला बाजूला करून लेखकाची शैली आत्मसात करावी लागते. सुधा मूर्ती यांची अनेक पुस्तकं मी भाषांतरित केली आहेत. त्यांचं इंग्लिश अगदी सोपं, बाळबोध, शाळेतल्या मुलांसारखं आहे. त्याचं भाषांतर करताना भाषेतला तो निरागसपणा जपणं महत्त्वाचं आहे. सध्या अनुवादित पुस्तकांचं पीक आलेलं दिसत असलं, तरी बरीचशी पुस्तकं नवोदित अनुवादकांनी घाईत केलेली दिसतात. त्यामुळं ही पुस्तकं पहिल्या आवृत्तीपुरतीच मर्यादित राहतात. आपल्याला नवे अनुवादक हवे आहेत. मात्र, त्यांनी घाईघाईत काम करणं टाळणं पाहिजे. अनुवाद म्हणजे पुन:कथन. दुसऱ्यांना एखादी गोष्ट समजावून सांगणं. वाचकांना ‘इम्प्रेस’ करणं हे अनुवादकाचं काम नाही. राजकीय पुस्तकांच्या अनुवादात खूप अभ्यास करावा लागतो. संदर्भ तपासावे लागतात. पूरक वाचन करावं लागतं. कॅथरिन फ्रँक यांनी लिहिलेल्या ‘इंदिरा’ या पुस्तकाचा अनुवाद करताना मला या सर्व गोष्टी कराव्या लागल्या. काही गोष्टी अनुभवाने ठरवाव्या लागतात. दोन्ही भाषांच्या संस्कृतीची जाण असली, तर पुष्कळ संदर्भ समजतात. त्याचा उपयोग होतो. एकेका पुस्तकासाठी किमान सहा महिने तरी वेळ द्यावा लागतो. अभ्यास करून अनुवाद केला, की तो वाचकांना आवडतोच.”

'उत्तम अनुवादकांची कमतरता'

औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाचे साकेत भांड म्हणाले, “मराठीत अनुवादांची संख्या वाढली आहे हे निश्चित. मराठीतून अन्य भाषांमध्ये अनुवादाचं प्रमाण कमी आहे. मराठी भाषा आणि ज्या भाषेत अनुवाद करायचा ती भाषा अशा दोन्ही भाषांवर प्रभुत्व असणाऱ्या अनुवादकांची कमतरता हे त्याचं प्रमुख कारण आपण म्हणू शकतो. परंतु त्यासोबतच आणखी एक मुख्य कारण म्हणजे मराठी भाषेतील दर्जेदार साहित्याची इतर प्रांतातील लोकांना ओळख करून देण्यात आपणच कुठे तरी कमी पडतोय. जागतिक दर्जा असलेल्या अनेक साहित्यकृती आजतागायत मराठी भाषेत निर्माण झाल्या आहेत. पण हे साहित्य अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचवायचं कसं याकडे मात्र आपलं तितकं लक्ष नाही. अर्थात काही प्रमाणात असे प्रयत्न सुरू आहेत. भालचंद्र नेमाडे, बाबा भांड, शरणकुमार लिंबाळे, शिवाजी सावंत, लक्ष्मण गायकवाड, रणजित देसाई, व. पु. काळे यांसारख्या प्रथितयश मराठी साहित्याकांक्षा साहित्याचे  इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाले आहेत. त्यामुळे मराठीतून अन्य भाषांमध्ये अनुवाद होण्याचं प्रमाण कमी असलं तरी तसे प्रयत्न मात्र नक्कीच सुरू आहेत. इंग्रजीतून मराठीत अनुवाद होणाऱ्या पुस्तकांची संख्या नक्कीच जास्त आहे. पण त्याव्यतिरिक्त आता हिंदी पुस्तकांचे अनुवादही मराठी भाषेत मोठ्या प्रमाणावर होतायत. त्याचं कारण म्हणजे हिंदी भाषेतही वेगवेगळे विषय सध्या हाताळले जातायत. हिंदीतली नवी पिढी तरुणाईसाठी त्यांना भावेल अशा भाषेत जोमानं लेखन करते आहे. हे साहित्य वाचकही उत्तम रीतीने स्वीकारत आहेत. पण त्याव्यतिरिक्त अन्य भारतीय भाषांमधून मराठी भाषेत होणारे अनुवाद मात्र कमीच आहेत. मी आधी सांगितलं त्याप्रमाणे मराठीसह ती विशिष्ट प्रादेशिक उत्तमपणे अवगत असणारे अनुवादक मर्यादित प्रमाणात आहेत. अर्थात अनेक अनुवादकांनी बंगाली, कानडी, तेलगू, गुजराती या प्रादेशिक भाषांमधल्या उत्तमोत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद केला आहे.”
अनुवादाच्या दर्जाबाबत बोलताना साकेत भांड म्हणाले, ‘‘मराठीत होणाऱ्या विपुल अनुवादांमुळे दर्जावर परिणाम झाला आहे असं थेट म्हणता येणार नाही. परंतु कधी तरी अपेक्षेप्रमाणे दर्जेदार अनुवाद मिळत नाही हेही तितकंच खरं आहे. माझ्या मते अनुवादकांनी अनुवाद करताना चिकित्सक पद्धतीनं अनुवाद करायला हवा. जेव्हा तुम्ही दुसऱ्या भाषेतली साहित्यकृती मराठी भाषेत आणता तेंव्हा मूळ लेखकाला काय म्हणायचंय याचा मथितार्थ लक्षात घेऊन अनुवाद व्हायला हवा. असे अनुवादक मिळणं आव्हानात्मक आहे. अर्थात मराठी वाचक सजग आहे. दर्जेदार आणि दर्जाहीन अनुवादातला फरक त्याला नक्कीच माहिती आहे. त्यामुळे दर्जेदार अनुवादालाच तो पसंती देतो. त्यामुळे भाषेचा दर्जा टिकून राहण्यासाठी दर्जेदार काम होणं आवश्यक आहे.”
“मराठीत सध्या फिक्शन, चरित्रं, आत्मचरित्रं, मोटिव्हेशनल, मॅनेजमेंट, आरोग्यविषयक, मानसशास्त्रविषयक, तसेच व्यक्तिमत्त्व विकासासंदर्भातल्या पुस्तकांचे अनुवाद मोठ्या प्रमाणात वाचले जातात. इंटरनॅशनल बेस्टसेलर्स असलेल्या अनेक पुस्तकांचे अनुवाद आम्ही प्रकाशित केले आहेत. सध्या स्पर्धेचं युग आहे. त्यामुळे प्रेरणादायी पुस्तकांच्या अनुवादांना वाचकांकडून मोठी मागणी आहे. मराठीत सध्या अनेक तज्ज्ञ अनुवादक आहेत. पुस्तकाच्या आशयानुसार ओघवता अनुवाद करणारे अनुवादक विषयाला योग्य न्याय देतात. कामाचा दर्जा सांभाळण्यासाठी त्यांची त्यावर सातत्यानं काम करण्याची तयारी असते. संपादकांशी बोलून त्यात अपेक्षित असलेले बदल करणं, आवश्यक त्या भागावर काम करणं हा अनुवादाच्या प्रक्रियेचाच भाग आहे. रेफरन्ससाठी अनुवादक इंटरनेटचाही सध्या मोठ्या प्रमाणात वापर करतात. अशा अभ्यासू पद्धतीनं केलेल्या अनुवादामुळे दर्जा सांभाळण्यास मदत होते,” असंही भांड यांनी सांगितलं.

‘प्रकाशकांनी संपर्क वाढवावा’

नगरमध्ये राहून गेली अनेक वर्षं व्रतस्थपणे बंगालीतून मराठीत मोठ्या प्रमाणावर पुस्तके अनुवादित करणारे ज्येष्ठ अनुवादक प्रा. विलास गिते म्हणाले, “मराठीतून अन्य भाषांमध्ये कमी प्रमाणात अनुवाद होतात. काही पुस्तकांचा अनुवाद होऊ शकत नाही. उदा. पुलंची पुस्तकं व त्यातला विनोद. याचं भाषांतर करणं अशक्य आहे. अलीकडे शांता गोखले यांनी ‘स्मृतिचित्रे’चा नवा अनुवाद केला आहे. तो चांगलाच झाला असेल. अनुवाद सतत होत राहिले पाहिजेत, कारण भाषा सतत बदलत असते, असं म्हणतात. जुन्या अभिजात पुस्तकांचे अनुवाद परत परत व्हायला पाहिजेत. मात्र, भाषांतराचा दर्जा सांभाळला पाहिजे. अनेक जण ‘ठोकुनी देतो ऐसा जे’ थाटात काहीही भाषांतर करतात. असं करणं चुकीचं आहे. त्यातल्या त्यात साहित्य अकादमी अनेक चांगल्या अनुवादकांकडून भाषांतर करवून घेते. एकानं केलेला अनुवाद दुसऱ्या अनुवादकाकडं तपासायला पाठवते. तो अनुवाद प्रकाशित करावा की नाही, असं विचारलं जातं. माझ्याकडे असे अनेक अनुवाद तपासायला येतात. त्यात अनेक गमतीजमती असतात. मात्र, काटेकोर तपासणी होत असल्यानं साहित्य अकादमीच्या अनुवादांचा दर्जा चांगला असतो. अनेक प्रकाशकही काटेकोर तपासून घेतात. मात्र, कधी तरी संपादकांकडून काही चुका होताना दिसतात. मराठीतून अन्य भाषांत अनुवाद कमी होतात, याचं कारण प्रकाशक संपर्क साधण्यात कमी पडतात, असं वाटतं. प्रकाशकांनी अन्य भाषिक प्रकाशकांशी संपर्क वाढविला पाहिजे. मराठीत बंगाली व कन्नड या भाषांतून मात्र थेट अनुवाद होऊन येण्याचं प्रमाण चांगलं आहे. नॅशनल बुक ट्रस्टसारख्या संस्था मराठी पुस्तकांचे अनुवाद अन्य भाषांत करून घेतात. साहित्य अकादमीही कधी कधी इंग्रजीवरून अनुवाद करून घेऊ पाहते. माझ्याकडे एकदा बिभूतीभूषण बंद्योपाध्याय यांचा कथासंग्रह पाठवला होता. म्हणजे इंग्लिश अनुवाद पाठवला होता. त्याच्यावरून तुम्ही मराठी अनुवाद करा, असं म्हटले होते. मग मी म्हटलं, मला बंगाली येत असताना मी इंग्लिशवरून कशाला करू? मग मी बंगाली पुस्तक मागवून घेतलं आणि त्यावरून अनुवाद करून दिला. त्यांनीही तो प्रकाशित केला. पूर्वी नियतकालिकांमधून मराठी कथांचे वगैरे अनुवाद येत असत. आता हिंदी नियतकालिकंही बंद पडत गेली. साहित्य अकादमीचं ‘समकालीन भारतीय साहित्य’ हे एकच नियतकालिक राहिलं आहे. त्यात अनुवाद प्रकाशित होतात.”
“चांगला अनुवाद करण्यासाठी त्याला मराठी वळण देणं गरजेचं असतं. मी पहिला अनुवाद केला होता तो ‘रवींद्रनाथांच्या सहवासात’ या पुस्तकाचा. तो अनुवाद वाचताना मलाच वाटलं, की हे मराठी वळणाचं झालेलं नाहीय. मग मी पुन्हा तीनशे पानं लिहिली. तरीही वाटलं, की काही ठिकाणी मराठी वळण वाटत नाही. म्हणून परत तीनशे पानं लिहिली. या अनुवादाला नंतर साहित्य अकादमीचा सर्वोत्कृष्ट अनुवादाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला,” असा अनुभव प्रा. गिते यांनी सांगितला.

आश्वासक लेखकांची कमतरता

‘प्रथम बुक्स’च्या मराठी विभागाचे संपादक व अनुवादक सुश्रुत कुलकर्णी आपला अनुभव सांगताना म्हणाले, “अन्य भाषांतून मराठीत अनुवाद होण्याचे फिक्शनचे प्रमाण नॉन-फिक्शनच्या तुलनेत खूपच कमी आहे. मराठीतून अन्य भाषांमध्ये अनुवाद होण्याचे प्रमाण नगण्यच म्हणावे लागेल. पूर्वी मराठीतील अनेक अभिजात पुस्तके, कादंबऱ्या अन्य भारतीय भाषांत व इंग्रजीतही अनुवादित झाल्या आहेत. मात्र, समकालीन लेखनाविषयी बोलायचे झाले तर मराठीत आत्ता तरी संपूर्ण भारतात अपील होईल, असे लेखन करणारा लेखक विरळाच. ही आपली मर्यादा आहे. चाळिशीच्या आतले किती तरुण लेखक मराठीत सध्या आश्वासक लेखन करीत आहेत, असा प्रश्न विचारला तर फार समाधानकारक उत्तर मिळत नाही. इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद मोठ्या प्रमाणात वाचले जातात. मल्याळी भाषेत तर गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ हा खूप मोठ्या प्रमाणात वाचला जाणारा लेखक आहे. आपल्याकडेही आता परदेशांतील मोठमोठ्या लेखकांचे अनुवाद वाचले जात आहेत. मुराकामी किंवा हरारी यांच्या पुस्तकांच्या अनुवादाला चांगली मागणी आहे. मुळात अनुवाद चांगला होण्यासाठी अनुवादकही चांगल्या दर्जाचे हवेत. अनुवादक केवळ शब्दांचा अनुवाद करत नसतो, तर एक संस्कृतीच एका भाषेतून दुसऱ्या भाषेत आणत असतो. त्यामुळं अनुवादकाला दोन्ही भाषा, तेथील प्रदेश, संस्कृती यांचं उत्तम भान असावं लागतं. तसं नसेल तर अनुवादात उणेपणा येऊ शकतो.”
या प्रातिनिधिक चर्चेनंतर मराठी साहित्यातील अनुवाद प्रक्रियेविषयी काही मौलिक निरीक्षणे नक्कीच हाती गवसली. मराठीत सध्या चलती असलेल्या या सा्हित्यप्रकाराविषयी अधिक जागरूकता, अधिक अभ्यास आणि अधिक कुतूहल निर्माण झाले, तर मराठीत उत्तमोत्तम अनुवाद येतीलच; पण महत्त्वाचे म्हणजे मराठीतून अन्य भाषांत चांगल्या साहित्यकृती जातील आणि मराठीतील सकस साहित्यनिर्मितीची चर्चा जगभर होईल. एवढी अपेक्षा फार नसावी!

---


(पूर्वप्रसिद्धी ः महाराष्ट्र टाइम्स दिवाळी अंक २०२०)

---

21 Sept 2021

फिरकीचा ठोंब्या - भाग १७

निरोप 
--------


हाय, हाय! आम्ही आत्ता कुठं लेखकू म्हणून काहीसे प्रस्थापित होत होतो, तोच आमच्या या पेशाची भ्रूणहत्या व्हायची वेळ आली. 'कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ' ही म्हण आपल्याच बाबतीत कधी लागू होईल, याचा आम्ही विचारही केला नव्हता. पण नेमके तेच झाले. आमचे 'ठोंब्या'पण पुनश्च सिद्ध झाले. आमच्या एका निर्णयानंच आमच्यातल्या लेखकाला नख लावलं. आता कुठल्याशा एखाद्या छापखान्यात प्रूफरीडर म्हणून नोकरी धरणं किंवा पीआरचा धंदा टाकणं एवढंच आमच्या हाती उरलं आहे.
लेखक म्हणून आमचा अपमृत्यू कसा झाला, याची ती हृदयद्रावक कहाणी आता सांगितलीच पाहिजे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड हा मराठी सारस्वताचा वार्षिक पोळा, आपलं, मेळा होय. अर्थात 'पोळा' शब्द आमच्या मुखातून चुकून गेला असला, तरी तो अगदीच काही अयोग्य नव्हे. महाराष्ट्रदेशीच्या हृदयसम्राटाने साहित्यिकांस 'बैल' म्हटल्याच्या आठवणींचे जू अजूनही आमच्या मानेवर काचत्ये आहे. शिवाय साहित्यिक असो वा नसो, प्रत्येक संसारी मनुष्य विवाहोत्तर आयुष्यात ओझ्याचा बैलच असतो, या वास्तवाचा कासरा आम्ही कधीच सोडलेला नाही. त्यामुळं आम्ही किंचित लेखकू व्हायच्या आधीच लग्न करून बसल्यानं चांगले क्वालिफाइड 'बैल' झालोच आहोत. तर ते असो. मूळ मुद्दा आमच्यातला लेखक कसा मृत्यू पावला, याचा आहे. तर या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली आणि आम्ही वयात आलेल्या खोंडाप्रमाणं जागच्या जागी फुरफुरू लागलो. काहीही कारण नसताना आपण ही निवडणूक लढवावी, असा दुष्ट विचार आमच्या मनात झळकला. आमच्या डोईवरची (नसलेली) डौलदार शिंगं आम्ही उगाचच साहित्याच्या हेडक्वार्टराकडं बघत रोखून धरली. आता समोर येईल तो साहित्यिक आडवा करायचा हे एकच स्वप्न आमच्या मनात 'बुल्स आय'प्रमाणं कोरलं गेलं. आम्ही भावनेच्या भरात अर्ज करून बसलो. आता निवडणूक लढवणं अटळ झालं. आमच्या विरोधात बडे बडे साहित्यिक उभे होते. कुणी आयएएस ऑफिसर होते, तर कुणी प्राध्यापक होते. कुणी अनुवादक होते, तर कुणी समीक्षक होते. एक जण तर बरेच वयस्कर होते. ते स्वतःचं वय चार लाख वर्षं वगैरे सांगत होते. त्यांच्या आधार कार्डावरची जन्मतारीख आणि ते सांगत असलेलं वय न जुळल्यानं त्यांचा अर्ज तांत्रिक मुद्द्यावरच बाद होणार, यात आम्हाला काही शंका उरली नव्हती. पण तरी आम्ही बैलबुद्धीनं ही निवडणूक लढवणार नव्हतो. आमची होती नव्हती तेवढी तैलबुद्धी आम्ही पणाला लावली आणि घटक संस्थांमध्ये प्रचार करावयास सुरुवात केली. अनुभव विपरीत आले. 'या बैलाला काय कळतंय?' अशा काही प्रतिक्रिया आम्ही गौरवार्थ घेतल्या, तरी अन्य काही प्रतिक्रिया छापण्याजोग्या नव्हत्या. त्या वाचून छापखान्यानं स्वतःचंच खच्चीकरण करून घेतलं असतं हे नक्की. तर ते असो. आम्ही मतदारांच्या लिस्टा काढून बसलो आणि एकेका मतदाराला देव मानून फोन करावयास सुरुवात केली. त्यातल्या काही लोकांकडं फोन केला असता, संबंधित मतदार काही वर्षांपूर्वीच मयत झाल्याचं समजलं. तरीही साहित्य महामंडळाच्या निवडणूक मतदारयादीत नाव असणं ही विलक्षण प्रतिष्ठेची बाब असल्यानं या मतदारांच्या नातेवाइकांनी त्यांचं नाव त्या यादीतून वगळा, हे सांगण्याचे कष्ट केले नव्हते. एका ठिकाणी फोन केला, तर तो एका ब्यूटी पार्लरमध्ये लागला आणि त्यांनी माझ्याकडं हेअरकटची पाच हजार रुपये थकबाकी असल्याचं सांगितलं. हे ऐकून आमचे होते नव्हते तेवढे 'हेअर' जागीच उभे राहिले आणि आम्ही त्वरित फोन 'कट' केला. आणखी एका ठिकाणी फोन केला असता, तो पोलिस अधिकाऱ्यास लागला. घाबरून फोन ठेवू लागलो, तर ते साहेब मिशीतल्या मिशीत हसत (म्हणजे हा एक अंदाज हं...) 'काळजी करू नका, आमचं मत तुम्हालाच,' असं म्हणाले चक्क! म्हणजे ते खरोखर मतदार होते. बरेच फोन केले, पण 'ओरिजिनल' साहित्यिक काही कुणी भेटले नाहीत. एक वकील होते, एक बिल्डर होते आणि एक बँकवाले होते. या प्रकाराचा धसका घेऊन आम्ही फोन करणं सोडलं.
यानंतर हाय-टेक प्रचार करण्याच्या दृष्टीनं आम्ही आमची स्वतःची वेबसाइट लाँच करून टाकली. पण त्या साइटवर काय ठेवावं, ते कळेना. मग वृत्तपत्रांत आम्ही वेळोवेळी पाठविलेल्या 'वाचकांच्या पत्रव्यवहारा'ची व उपनगरीय पुरवण्यांमध्ये (त्यांच्या मजकुराची गरज म्हणून) छापून आलेल्या अत्यंत प्रासंगिक लेखांची कात्रणंच स्कॅन करून अपलोड करून टाकली. एवढ्या 'साहित्या'वर आम्ही संमेलनाध्यक्षपदाची आस धरली होती. हे म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत डिपॉझिट गेलेल्यानं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बघण्याइतकंच 'हे' होतं. पण लेखकू म्हणजे कल्पनेच्या जगात रमणारा यक्ष... आम्ही तरी दुसरे कोण होतो? आम्ही निवडणुकीचा अर्ज भरल्यापासून जणू संमेलनाध्यक्ष झाल्यासारखेच वागत होतो. प्रत्यक्ष निवडणूक अद्याप व्हायची होती. पण आम्ही चौखूर उधळलो होतो. यानंतर आम्ही घटक संस्थांच्या मुख्यालयी दौरे काढले. हा प्रवास खर्च झेपणारा नव्हता. त्यासाठी आमच्या हिनं फार कष्टानं करून ठेवलेली एक 'एफडी' मोडावी लागली. पण त्याला इलाज नव्हता. बडोदा ते भोपाळ, गोवा ते हैदराबाद असा आमचा सर्वत्र संचार सुरू झाला. घटक संस्थांचे पदाधिकारी आमच्याशी फारच प्रेमानं वागले. पुण्या-मुंबईच्या प्रकाशकांची ओळख करून द्या, या माफक अटीवर अनेकांनी आमचे पान वाढले. अनेक लोकांनी आपापले कवितासंग्रह आम्हाला भेट म्हणून दिले, तेवढं वगळलं तर बाकी प्रवासात फार त्रास झाला नाही. लेखकांना 'टोल'माफी नाही, हा एक अन्याय लक्षात आला. पण टोलवरच्या माणसानं 'आयकार्ड' दाखवा म्हटलं तर काय दाखवायचं हा एक प्रश्नच आहे. शिवाय अशी टोलमाफी मिळू लागली, तर आपला संपूर्ण देश एका रात्रीत साहित्यिक होईल यात आमच्या मनात शंका नव्हती. त्यामुळं आम्ही या अन्यायाविरुद्ध उठवायचा आवाज मनातच ठेवला आणि पुढल्या संस्थेकडं कूच केलं. अशा पद्धतीनं अनेक मतदारांना भेटी देऊन, घटक संस्थांना भेटी देऊन आपल्या प्रचाराचं बरंच 'कुकूचकू' केल्यानंतर, आता आपला अध्यक्षपदाचा सूर्य उगवायला हरकत नाही, असं आम्हाला वाटून गेलं. तरी अजून बरीच आव्हानं राहिली होती.
साहित्य महामंडळाचं हेडक्वार्टर नागपुरात गेल्यापासून आम्ही नागपूरकर होण्याचा प्रयत्न आरंभिला होता. 'बे'चा पाढा परत पाठ करायला सुरुवात केली होती. 'सावजी'चं वेड नसलं, तरी 'विष्णूजी, विष्णूजी' करायला सुरुवात केली होती. चार-दोन साहित्यिक मित्रांना 'काय बे भैताडा' म्हणून पाठीत गुद्दे घातले होते. पुण्यातल्याच मिठाईच्या दुकानातून संत्रा बर्फी आणून ही कशी नागपूरची अस्सल संत्रा बर्फी आहे, असं सांगून भाव खाल्ला होता. एलकुंचवार व ग्रेस यांचं ९० टक्के साहित्य कळत नसलं, तरी त्यांच्या साहित्यावरच आमचा पिंड कसा बालपणापासून पोसला आहे, हे सांगणाऱ्या काही पोस्ट्स अशाच शेअर करून टाकल्या. वडाभात कशाशी खातात हेही आम्हास ठाऊक नव्हतं, याचं कारण आम्ही भातावर वडापावातला बटाटेवडा कुस्करून घातला आणि तो फोटो 'इन्स्टाग्राम'वर शेअर केला. त्यानंतर आमची यथेच्छ टवाळी उडवण्यात आली. अर्थात अजून आम्हाला महामंडळाच्या अध्यक्षांवर छाप पाडायची होतीच. त्यामुळं आम्ही दाढी वाढवायला सुरुवात केली. काही दिवसांतच आमचा चेहरा सध्याच्या अध्यक्षांसारखा घटकेत करुण, तर घटकेत रागीट दिसू लागला. सरकारच्या निधीचा विषय निघाल्यास करुण आणि सहभागी लेखकांच्या मानधनाचा विषय निघाल्यास रागीट असा त्याचा पोटभेद समजल्यावर मग आम्हाला त्या त्या प्रसंगी तसे चेहरे करणं साधूनच गेलं. तरी त्यांच्या व आमच्या प्रत्यक्ष भेटीचा प्रसंग अफजलखान-शिवाजीमहाराज भेटीपेक्षा कमी थरारक नव्हता. (आता या भेटीत शिवाजीमहाराज कोण व अफजलखान कोण, याचा फैसला आम्ही भावी साहित्य इतिहासकारांवर सोपवतो.) तर ते असोच.
एवढे सगळे प्रयत्न करूनही आपण अध्यक्ष होऊच याची काही खात्री नव्हती. प्रशासक उमेदवार जोरात होते, अनुवादक हवेत होते, समीक्षक लाटेवर होते, तर कथाकार तरंगत होते. आम्हीही उभे आहोत, याची कुणाला कल्पनाही नव्हती, याचं आम्हास अधिक दुःख झालं. पण मतदारांच्या 'आतल्या आवाजा'ला आम्ही आर्त अशी साद घातली होती. मराठी सारस्वताचा मेरुमणी निवडणारी हजारेक मेंदूंची क्षमता फारच अचाट होती, याचा आम्हाला काहीसा अंदाज आला होता. आता सर्वस्वी 'त्याच्या' हातात होतं...
... आणि तो दिवस उजाडला. संमेलनाध्यक्षपदी चक्क आम्ही निवडून आलो. एका अल्पस्वल्प बुद्धीच्या 'ठोंब्या' लेखकूचा झालेला हा सन्मान पाहून आमचा आमच्यावरच विश्वास बसेना. पण मुलाखती घ्यायला आलेले चॅनेलचे व वृत्तपत्रांचे पत्रकार पाहून खात्री पटली. कुणी तरी पेढ्यांचा बॉक्स आमच्या हिच्या हाती सोपविला. तिनं सराईतासारखा अर्धा पेढा आमच्या मुखी भरवला. कॅमेऱ्यांचे फ्लॅश लखलखले... मुलाखती झाल्या... आम्हाला आनंदाश्रू आवरेनात. मुलाखतीला आलेल्या पत्रकारांनाही अश्रू आवरेनात. दोघेही एकमेकांना खांदा द्यायला धडपडलो. अखेर मुलाखती संपल्या. अशा मुलाखतींत काय सांगायचे असते ते आम्ही पाठच करून ठेवले होते. त्यानुसार, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार, हा हुकमी लीड आम्ही पत्रकारांना काढून दिला. त्यावर एका चावट पत्रकाराने 'संमेलनाध्यक्षपदाला यापुढील काळात तरी अभिजात दर्जा मिळेल काय?' असा प्रश्न विचारून आमचे पित्त खवळवले. तरी आम्ही आलेपाक तोंडात ठेवून शांतता पाळली. संमेलन होईपर्यंत अशा भोचक पत्रकारांपासून सावध राहावे, एवढी खूणगाठ मनाशी बांधून ठेवली.
आता संमेलन येईपर्यंत नव्या नवऱ्याच्या तोऱ्यात राहायचं... सगळीकडं मुलाखती देत फिरायचं... डोईवर आहेत नाहीत ते सर्व केस काळे करून घ्यायचे (अरे, 'काळे'वरून आठवलं... आत्ताचे अध्यक्ष कुठं भेटले का हो?) असे अनेक कार्यक्रम मनात तयार होत होते. संमेलन संपल्यावर राज्यभर फिरण्यासाठी एक लाखाचा चेक मिळणार आहे, या कल्पनेनंच हुशारी आली. ते पैसे वापरून सगळीकडं फिरायचं, राज्य नुसतं शहाणं करून सोडायचं असा संकल्प आम्ही लगेचच संकष्टीचा मुहूर्त धरून करून टाकला. (संकष्टीवरून आठवलं, बरेच दिवस अष्टविनायक यात्रा करायची राहिली आहे. येत्या वर्षात जमून जाईल...!)
अशी सगळी मज्जा मज्जा सुरू असताना अचानक आपल्याला अध्यक्षांचं भाषण लिहायचंय हे लक्षात आलं. आमची एकदम घाबरगुंडी उडाली. आम्हाला काही अध्यक्षांचं भाषण लिहिता येत नव्हतं. आता काय करावं? मग गेलो प्रशासक उमेदवारांकडं... ते पडले असले, तरी मनानं चांगले होते. त्यांच्या कानावर अडचण घातली. ते म्हणाले, हात्तिच्या! एवढंच ना... मी लिहितो की तुमचं भाषण... त्यांनी तातडीनं एका स्टेनो बोलवून त्याला भाषण डिक्टेट करायला सुरुवात केली...
आम्ही आयतं भाषण घेऊन घरी आलो आणि येताना लक्षात आलं, की अरेच्चा, आपल्यातला लेखक मरण पावला आज... हळहळ वाटली... खिशाला लावलेलं पेन नदीवर तर्पण करून आलो....
आणि मग एकदम साक्षात्कार झाला, अरे, ये तो होना ही था! आपण संमेलनाध्यक्ष नाही का झालो? मग आपण आता सामान्य लेखकू कसे राहणार? हे लक्षात आलं आणि आम्ही हुश्श केलं... आमच्यातला 'ठोंब्या' आता हुशार झाला होता... मग लगेच आम्ही आमच्यातल्या लेखकाला 'निरोप' दिला आणि पीआर म्हणून नव्या संमेलनस्थळी कूच केलं...

---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, जानेवारी २०१८)

---

(समाप्त)

---

फिरकीचा ठोंब्या - भाग १६

साभार परत...
-----------------


यंदा दिवाळी कधी आली अन् झटकन गेली, ते कळलंच नाही. वास्तविक ऑक्टोबर हा दिवाळीचा महिनाच नव्हे. नोव्हेंबर हा दिवाळीचा खरा मानकरी. या काळात पुण्यनगरीत जी थंडी पडते ना, त्या थंडीचे कोंदण दिवाळीला हवे. अर्थात ऋतुबदलाचा कुठलाही परिणाम आम्ही स्वतःवर होऊ देत नाही. आम्ही खुद्द किंचित लेखकू असल्यानं दिवाळी अंकांत लिहिणं हे आम्ही साहित्याप्रती आमचं कर्तव्यच समजतो. मराठी वाचकांना लाडू, चकली, करंज्या, कडबोळी, अनारसे, शंकरपाळी या फराळासोबतच कथा, कविता, लघुकथा, लघुकविता, व्यक्तिचित्रे, व्यंगचित्रे यांचाही फराळ लागतो, हे साहित्यिक सत्य आहे. सांप्रतकाळी 'आम्ही दिवाळी अंक वाचत नाही' असं म्हणायची एक फॅशन आली आहे म्हणे. हे म्हणजे 'आम्ही गोड खात नाही,' असं म्हणण्यासारखंच फॅशनेबल झालं. पण वास्तविक खरं काय आहे ते सगळ्यांनाच माहिती असतं. ज्या कुणाला दिवाळी अंक वाचावेसे वाटत नाहीत, त्यांच्या कथा वा कविता नक्कीच दिवाळी अंकांच्या संपादकांकडून परत आल्या असाव्यात. 'कोल्ह्याला द्राक्षे आंबट' या न्यायानं त्यांना मग अन्य कुणाचं लिखाण वाचावंसं वाटत नसेल. पण आम्ही उदार अंतःकरणाचे इसम असल्यानं त्यांना समजून घेऊ शकतो. याचं कारण आम्हीही एके काळी हे दुःख सोसलं आहे. 'फाशी' किंवा 'जन्मठेप' या शब्दांपेक्षा अधिक धसका आम्ही 'साभार परत' या शब्दांचा घेतला होता. हल्ली मेलवर मजकूर पाठवतात. आपली मेल उघडलीच न गेल्याचा अनुभव आम्ही कित्येकदा घेतला आहे. काही विविक्षित संपादकांना व्हॉट्सअपवर पाठवलेल्या मेसेजवर 'सीन'च्या दोन निळ्या दांड्या पाहूनही संबंधित संपादकांनी उत्तर न दिल्यानं काही वेगळं 'सिन' करण्याचे विचारही मनात येऊन गेले आहेत. आमच्या परत आलेल्या एकेक लेखावर आणि कवितेवर स्वतंत्र लेख होऊ शकेल. तोही कुणी छापेल असं वाटत नाही. तर ते असोच.
हळूहळू तो दुष्काळ सरला आणि आमचंही साहित्य वेगवेगळ्या दिवाळी अंकांत प्रसिद्ध होऊ लागलं. ते अर्थात यथातथाच असावं. पण वाढत्या दिवाळी अंकांना लागणारा वाढता मजकूर ते तरी कुठून आणणार? तिथं आमच्यासारख्यांनी अनाहूत पाठवलेलं साहित्य उपयोगी पडत असणार. (असं काही साहित्य वाचून तर 'आम्ही दिवाळी अंक वाचत नाही' असं म्हणण्याची फॅशन रूढ झाली नसेल ना!) पण काही का असेना, आम्ही दिवाळी अंकांतून झळकू लागलो, तसे अभिजात लेखकाचे एक तेज आमच्या चेहऱ्यावर अवतरू लागले. आम्ही काही नामांकित अभिजात लेखकांचे फोटो पाहू गेलो असता, भ्रमनिरास जाहला. उसाच्या रसाऐवजी एरंडाचा रस प्यावा लागला, तर साधारण जसा चेहरा होईल, तशा चेहऱ्यांना पाहून आम्ही अभिजात बेहोश झालो. त्यानंतर आमच्या चेहऱ्यावर आलेले तेज हे तेज वगैरे काही नसून, दिवाळीत फराळाच्या नावाखाली केलेल्या वाट्टेल त्या खादाडीचा पुरावा मिरवणारी सूज आहे, हे लक्षात आलं. आणखी एक भ्रमनिरास! काही नामवंत दिवाळी अंक विकत घेतल्यानंतर हल्ली जो होतो तोच!!
आम्ही दिवाळी अंकाचे लेखकू म्हणून मिरवू लागल्यावर स्वाभाविकच अन्यांचे लेख वाचणे हा प्रकार बंदच झाला. आम्ही आमचाच लेख तिन्ही-त्रिकाळ मुखासमोर बघून आनंदी होऊ लागलो. आपणच लिहिलेला लेख पुनःपुन्हा वाचून आम्ही मनोमन खूश होऊन गेलो. आपल्या अवतीभवती चाहत्यांचा, विशेषतः तरुण मुलींचा गराडा पडला असून, आपण त्यांना स्वाक्षऱ्या देत आहोत, असलं काहीबाही स्वप्न दिवसाढवळ्या आमच्या डोळ्यांसमोर तरळू लागलं. 'दिवाळी अंकाच्या लेखकानं एवढं फुटेज खायचं नसतं,' या आमच्या एका नतद्रष्ट मित्राच्या सल्ल्यानंतर आम्ही भानावर आलो. आमच्या पैशानं रविवारी सकाळी फुकटची मिसळ चापून आम्हालाच वर उपदेशामृत पाजणाऱ्या या मित्राचं काय करावं, हे आम्हाला कळलेलं नाही. त्याला एखाद्या पडेल दिवाळी अंकाच्या जाहिरातींची बिलं गोळा करायला पाठवावं, असा दुष्ट विचार कैकदा मनात येतो. पण आम्ही उदार अंतःकरणाचे असल्यानं दर वेळी तो सुटतो.
आम्ही लेखकू झाल्यानंतर लोक आम्हाला इतर दिवाळी अंकांविषयी प्रतिक्रिया विचारू लागले. त्यावर अंक न वाचताही मत व्यक्त करण्याचं एक हुकमी कसब आम्ही साधलं आहे. उदा. काही नामांकित दिवाळी अंकांचा कस आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, हे वाक्य टाकायला कुठल्याही अभ्यासाची गरज भासत नाही. एखाद्या दिवाळी अंकात जाहिराती वाढल्या असतील, तर ती असूया मजकुराबाबत कुत्सित कमेंट टाकून व्यक्त करता येते. एखाद्या दिवाळी अंकात गेल्या वर्षीपेक्षा एखादी कथा कमी आली असेल, तर 'चांगले कथाकार मराठीत राहिलेत कुठं?' हे वाक्य अगदी सहज भिरकावता येतं. असं केल्यानं आम्ही खऱ्या अर्थानं लेखकू म्हणून सिद्ध होतो. याशिवाय आपले लेख वा कविता नाकारणाऱ्या संपादकांचा व त्यांच्या अंकाचा यथेच्छ वचपा काढता येतो, ते वेगळंच!
त्यातच हल्ली दिवाळी अंकातले लेख गाजवता येतात म्हणे. सोशल मीडिया वापरण्यात आपण तज्ज्ञ असलं पाहिजे, एवढी एक अट यामागं आहे. मुळात आपला लेख कितीही भारी असला, तरी दिवाळी अंक विकत वगैरे घेऊन फार काही खूप लोक तो वाचणार नसतातच. त्यामुळं तो लेख सोशल मीडियावर टाकून उगाचच एक हवा करायची. असा लेख अर्थातच पूर्ण कधीही प्रकाशित करायचा नसतो. त्या लेखातील उत्तेजक, उन्मादक इ. इ. भागच जाहिरातवजा प्रसिद्ध करायचा असतो. (त्यासाठी अर्थात असा उत्तेजक, उन्मादक, उत्कंठावर्धक भाग मूळ लेखात असावा लागतो, एवढी एक बारीकशी अडचण आहे खरी.) पण हल्ली तेवढं बहुतेक लेखकूंना जमतं. उदा. आपण नव्या काळातले, आधुनिक कथाकार असू, तर स्त्री-पुरुष संबंधांबाबत काहीही लेखन करताना इंग्लिश शब्द वापरावेत. (मुळात आपण आधुनिकोत्तर आधुनिक कथाकार असू तर स्त्री-पुरुष संबंधांबाबतच लिहिणार नाही; कारण ती मागास गोष्ट ठरेल, हा भाग वेगळा!) तरी इंग्लिश शब्द वापरत लेख लिहिण्याची खुमारी काही वेगळीच असते, हे ध्यानात असू द्यावे. 'सीसीडीत एक्स्प्रेसो मागवून टीनानं लॅपटॉप ऑन केला, तेव्हा तिच्या थॉट प्रोसेसशी वेव्हलेंग्थ न जुळल्यानं कबीर डिस्टर्ब झाला... तिच्यासोबतचं नाइटआउट आठवून त्याच्या टेस्टस्टेरॉनची हायपर अॅक्टिव्हिटी सुरू झाली...' वगैरे वाक्यं लिहिली, की वाचणाऱ्याला हायक्लास कथा वाचत असल्याचा फील येतो. 'हा महानगरी संवेदना दाखविणारा लेख असल्यानं वाचक त्याच्याशी सहज रिलेट करू शकतो,' असं एक वाक्य समोरच्याला ऐकवायचं. मग आपल्याला लेखकूसोबत किंचित समीक्षकूही झाल्याचा आनंद होतो.
महानगरी संवेदनांसोबतच हल्ली ग्रामीण संवेदनाही जोरात आहेत. फक्त त्यांना ग्रामीण संवेदना न म्हणता, 'अस्सल मातीतला अनुभव', 'मुळांशी नातं सांगणारी कथा', 'वास्तवाची करपणारी दाहक धरती' वगैरे म्हणावं लागतं. अशा कथांमध्ये किंवा लेखांत आपल्यावर सतत अन्याय होत असल्याची भावना, कटिंग करून आल्यानंतर शर्टातले केस मानेवर टोचतात, तशी सदैव टोचत राहणं 'मस्ट' आहे. अशा कथा वा लेख लिहिताना ग्रामीण जीवनाशी आणि तिथल्या शब्दांशी परिचय असणं गरजेचं आहे. उदा. 'सांजचा वखत होता, चारी अंगानं फुफाटा उठला होता... धुळीच्या लोटात, करपलेल्या बाभळीच्या जोडीला उभं अंग जाळणारं ऊन माळरानावर वस्तीला आलं होतं... तेव्हा शंकरला लांबून येणारी एस्टी दिसली... आता तालुक्याला जाऊन एकडाव बैल इकला, म्हंजी चंद्रीच्या लग्नाचं बघता येईल,' असा मजकूर दिसल्यास किमान पासापुरते तरी मार्क मिळायला हरकत नसते. ग्रामीण कथा लिहिताना त्यात शेतकरी, शेती, बैल वा एसटी यांचा उल्लेख न आल्यास तो 'फाऊल' धरला जातो हे माहिती असावं. अर्थात हेही पुन्हा जुनंच वळण झालं. आधुनिक ग्रामीण कथा पण सोशल मीडियाच्या बाजेवर रेलून मस्त शीळ घालते आहे, हेही लक्षात असू द्यावं. तिथं ग्रामीण शृंगाराचं टेचात वर्णन करता आल्यास पासापुरते मार्क वाढून डिस्टिंक्शन मिळण्याची शक्यता वाढते. 'विहिरीवर शेंदायला आलेल्या वाडीवरच्या शेवंताची उघडी पाठ आबाला अस्वस्थ करीत होती. हातातल्या व्हॉट्सअपवर गावातल्या छपरी पोरांच्या ग्रुपमध्ये आलेला ताजा व्हिडिओ पाहतानाच आबाला शेवंता दिसल्यानं त्याचं मन थाऱ्यावर राहिलं नव्हतं. खाली पाटाच्या पाण्याला वाट गावत नव्हती. आबानं मोबाइल खिशात टाकला अन् हातातल्या फावड्यानं बांध फोडला आणि पाणी वाट फुटल्यागत वाहू लागलं...' असा आधुनिक जीवनाचा स्पर्श असलेली ग्रामीण कथा लिहिता येणं आवश्यक आहे. इथं लेखकाच्या प्रतिभेच्या पाण्यालाही मुक्त वाट फुटल्याचं आपल्याला जाणवेल.
याशिवाय विनोदी आणि गूढकथांना दिवाळी अंकांत मरण नाही. विनोदी कथा लिहिता येणं हे अवघडच. पण अनेक हुकमी लेखक हा हा म्हणता विनोदी कथा लिहितात. त्यातच दुसऱ्याच्या बायकोसोबतची 'फँटसी' हा एक या लोकांचा चिरतरुण विषय आहे. या कल्पनेतल्या वहिन्यांनी कित्येक वर्षं दिवाळी अंकांना उठाव दिला आहे, त्याबद्दल या समस्त विनोदी लेखकूंनी त्यांना (कल्पनेतच) पैठण्या पाठवायला हव्यात, असं आपलं आमचं मत आहे.
गूढकथा हाही तसा अवघड प्रकार. पण हल्ली नेटफ्लिक्स किंवा अॅमेझॉन प्राइम किंवा तत्सम वाहिन्यांवर घरबसल्या अनेक परदेशी मालिका पाहायला मिळतात. त्यातलं एखादं सूत्र धरून एखादा बरा लेखक सहज गूढकथा हाणू शकतो. या गूढकथांचं कथानक कोकणातल्या एखाद्या खेड्यात घडत असेल, तर पुढचा विषय तसा सोपा होतो. मतकरी, दळवी, धारप थोडेफार वाचले, की एक मध्यम आकाराची गूढकथा तयार होते. ती वाचून अंगावर काटा नाही फुलला, तर लेखकाचा काटा काढण्याची सुरसुरी येते. ती मात्र दाबून धरावी!
कविता हा तर फार मोठा विषय. आमच्यासारखा गद्य माणूस तिच्या फार वाटेला जातच नाही. तरीही काही दिवाळी अंकांत नामवंत कवी वर्षानुवर्षं भिकार कविता का लिहीत असावेत, हा गहन प्रश्न मनात येतोच. यांची प्रतिभा दिवाळीआधीच सुट्टीवर जात असावी, असा एक संशय आहे.
आणखी एक शंका. 'आम्ही दिवाळी अंक वाचत नाही,' असं म्हणणाऱ्यांनी या अंकांच्या किमती पाहून तसं म्हटलंय का? कारण काही काही दिवाळी अंकांच्या किमतींनी यंदा खरंच कहर केला. चारशे रुपयांना एक अंक विकला जात आहे, हे पाहून भरून आले अन् गहिवरूनही आले. त्या मानानं मानधनात काहीच वाढ झाली नाही. पण हा सगळा 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' असल्यामुळं कोण बोलणार? मागे एकदा एका संपादकांकडं मानधनाचा विषय काढला असता, त्यांनी आमचे माता-पिता काढले. विषय तिथंच संपला. आमच्या एका होतकरू लेखक मित्रानं एका संपादकांकडं मानधन मागितले असता, संबंधित लेख वाचला म्हणून तुम्हीच आम्हाला मानधन का देऊ नये, असा सवाल करून त्या महाशयांनी आमच्या बिचाऱ्या मित्राची बोबडी वळविली होती. थोडक्यात, लेखक व कवीमंडळींना मिळणारं मानधन हा एक करुण विषय असल्यानं त्याविषयी बोलताना दर वेळी अश्रुपाताचा अनवस्था प्रसंग ओढवतो. त्यामुळं नकोच तो विषय!
बाकी 'साभार परत' साहित्याविषयी न बोलणंच बरं. आम्ही आता त्या कॅटॅगरीतून वर गेलो आहोत. त्यामुळं आता पुन्हा तिकडे पाहणे नाही. 'पुढच्या वर्षी अजिबात दिवाळी अंक वाचणार नाही,' असा घोर निश्चय आम्ही गेल्या वर्षी काही अनाकलनीय कारणांनी केला होता. यंदा आमचेच लेख असलेले काही अंक घरी येऊन पडले अन् आम्हाला साहित्यपाझर फुटला... आम्ही लगालगा बाजारात गेलो अन् गेल्या वर्षीएवढेच अंक विकत घेऊन आलो...
आमचा गेल्या वर्षीचा निश्चय 'साभार परत' करून...!

----

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, डिसेंबर २०१७)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

---

फिरकीचा ठोंब्या - भाग १५

लेखक 'रसिक' जाहला...
------------------------------

लेखक म्हणून पुस्तकांच्या 'नकादु'ला भेट देणं हे आमचं एक आद्य कर्तव्यच होऊन बसलं आहे. पुण्यातले पुस्तकांचे 'नकादु'दार आहेत पण फार भारी भारी! मागच्या वेळेला पुस्तकांच्या पेठेत गेलो होतो... तिथल्या मालकांचं मिठीदार आतिथ्यही अनुभवलं; पण खऱ्याखुऱ्या पेठेतल्या पुस्तकांच्या दुकानांची सर कशालाच नाही. या दुकानात आमचे 'सर' बसतात, म्हणून आम्ही हे म्हणत नाही; तर खरंच या दुकानांना कश्शाची सर नाही.
अप्पा बळवंत चौक हा पुण्यातला ऐतिहासिक चौक. या चौकाच्या चारही रस्त्यांना पुस्तकांची भरपूर दुकानं वस्तीला आहेत. ही दुकानंही अप्पा बळवंतांएवढी नसली, तरी आपल्या स्वतःच्या 'अप्पाआजोबां'एवढी तरी नक्कीच ऐतिहासिक जुनी आहेत. त्यांच्या खणांना खास पुणेरीपणाचा वास आहे. तिथल्या खांबांना पेठ नामक अवलिया गोष्टीचं तेलपाणी लागलेलं आहे. तिथल्या प्रभात टॉकीजएवढ्याच जुन्या कर्मचाऱ्यांच्या अंगात बाळपणापासून मुठेचं पाणी चढलेलं आहे. तेव्हा इथं जायचं तर आपला मान, अभिमान, स्वाभिमान आदी आपल्या दुचाकीबरोबरच लांब कुठं तरी 'पार्क' करून यावा लागतो. 'आपल्याला पुस्तकांतलं फार कळतं' हा गंड तर मुठेतच विसर्जन करून यावा लागतो. कारण इथल्या कोपऱ्यातल्या एका खणातल्या छोट्या दुकानातला ग्रंथप्रेमी विक्रेताही तुम्हाला जागतिक वाङ्मयातली लेटेस्ट पुस्तकं विष्णुसहस्रनामासारखी म्हणून दाखवील. तेव्हा तो नादच न करणे इष्ट होय. आम्ही पहिल्या प्रथम इथल्या दुकानांच्या पायऱ्या कधी चढलो हे आठवत नाही. पण फार लहानपणापासूनच अनमोल, रसिक, सरस्वती आणि प्रगती-व्हीनस हे 'चारधाम' करायची सवय लागली एवढं नक्की... आधी शाळेची पुस्तकं, मग बालसाहित्य, मग तरुणपणीच्या कथा-कादंबऱ्या, नंतरचं वैचारिक प्रौढ वाङ्मय हे सगळं या चारीधाम यात्रेतच घडलं. (अजून खऱ्या चारधाम यात्रेला जायची वेळ आलेली नाही. पण जेव्हा येईल तेव्हा धार्मिक ग्रंथांची खरेदी इथूनच होईल, यात शंका नसावी.)

यातही आज विषय आहे यातल्या अंमळ अधिक 'रसिक'वाल्यांचा... अर्थात 'साहित्य सूची'वाल्यांचा... (थोडक्यात 'सा.सू.'च्या मालकांचा... अर्थात सासरेबुवांचा!) हल्ली त्यांच्यातल्या 'रसिका'नं आणि 'रसिक'नंही कात टाकलीय. जुनं-जीर्ण 'नकादु' अगदी झक्कास झालंय. अगदी आधुनिक शो-रूमसारखं रूपडं ल्यायलं आहे. हारीनं मांडलेली पुस्तकं, (पेठेच्या मानानं) मोकळी जागा आणि तुलनेनं फारच प्रेमानं वागणारा स्टाफ हे बघून आम्ही वेळी-अवेळी या दुकानाच्या पायऱ्या चढू लागलो आहोत. अर्थात फार शहाणपणा करायचा नाही, हे तत्त्व पक्कं लक्षात ठेवूनच; अन्यथा आपली 'पायरी' दाखवण्याचं सामर्थ्य इथं वावरणाऱ्या प्रत्येक 'रसिका'कडं आहे, याची नम्र जाणीव आम्हास आहे. एकदा आम्ही आमचंच एक पुस्तक मागण्याचं औद्धत्य दाखवलं होतं. समोरच्या काकांनी बराच वेळ लक्षच दिलं नाही. अशा कृतीतूनही लोक पुष्कळ काही सांगत असतात. त्या 'बिटवीन द लाइन्स' वाचायची पात्रता आताशी आमच्या अंगी येऊ लागली आहे. त्यामुळं पुन्हा काही आम्ही त्या दुकानात हे वाक्य उच्चारलेलं नाही. 'खपली असतील हातोहात' असा मनाशी ग्रह करून घेतो झालं. (असो. त्या जखमेवरची 'खपली' आता काढायला नको!) पूर्वी आमचा संबंध फक्त खालच्या मजल्याशीच यायचा. पण 'नकादु'च्या मालकांची ओळख झाली आणि या 'रसिक'ला वरचा मजलाही आहे, हे ध्यानात आलं. दुकानाचे मालक नावाप्रमाणेच 'रसिक' आहेत, हे सांगायला नकोच! ते पुस्तकांचे विक्रेते, संपादक, प्रकाशक, मुद्रक तर आहेतच; वर माणूस म्हणून भलतेच रसिक आहेत. अनेक गुण त्यांच्या ठायी एकत्र नांदुत... आपलं, नांदत आहेत, हे आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. या वरच्या मजल्याला जायला दोन वाटा आहेत. एक नेहमीची, समोरची... आणि दुसरी चौकातल्या एका चोरवाटेनं येणारी. आम्ही अनेकदा या चोरवाटेनं थेट वरचा मजला गाठतो. अर्थात कुठूनही गेलं तरी चपला बाहेरच काढाव्या लागतात. चपला जातील या भीतीनं माणूस संपादकांचा फार वेळ घेत नाही आणि साधारण अर्ध्या तासानी येणाऱ्या 'येईलच हो चहा आत्ता' नामक आमिषाला बळी पडत नाही, हा यातला अतिरिक्त फायदा! (चोरी जाईल या लायकीची चप्पलच घालत नसल्यानं, चहा घेतल्याशिवाय आम्ही खाली उतरत नाही, हा भाग वेगळा.) वर दोन गुहा आहेत. एका गुहेत आमचे सर-संपादक बसतात, तर दुसऱ्या गुहेत त्यांचे प्रेमळ भाऊ बसतात. पण कधी कधी संपादक भावाच्या गुहेतही (अर्थात तो नसताना) जाऊन बसतात. कुणाला कुठल्या गुहेत भेटायचं याचे त्यांचे काही संकेत असावेत. ते काही आपल्याला समजत नाहीत. पण स्वतःच्या गुहेत संपादक मालकासारखे बसतात, एवढं खरं. सिंहाच्या गुहेत आत गेलेली पावले दिसतात आणि बाहेर येणारी दिसत नाहीत, असं म्हणतात. इथं आत गेलेलं हस्तलिखित वा तत्सम काहीही पुन्हा बाहेर येताना दिसत नाही. बाकी इथं आत गेलेला लेखकही बाहेर येताना पुन्हा 'तो' लेखक नसतो. त्याच्या वरच्या मजल्यात काही तरी भरच पडलेली असते. याचं कारण संपादकांनी त्याच्या लिखाणातल्या दोषांचं दिग्दर्शन करून, त्याच्या सदराचा सदरा नीटच फाडलेला असतो. त्यामुळं तो पुन्हा शिवून आणण्याखेरीज गत्यंतरच नसतं. याखेरीज हे संपादक महाशय बरेच उपद्वयाप करतात. आपल्या लेखकांना कुठं तरी ट्रिपला काय नेतात, जेवायला काय घालतात, साप्ताहिक मीटिंगा काय घेतात, लेखकांसोबत (लेखिकांबरोबर अधिक) हास्यविनोद काय करतात! खेरीज गावातल्या उत्तमोत्तम कार्यक्रमांची निर्मिती करतात, दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम स्वतः जाऊन बघतात...छे छे! प्रकाशक आणि संपादक या दोन्ही संस्थांना बट्टा लावण्याचे काम हे गृहस्थ करतात. आता हे करताना कधी कधी मानधन द्यायला विसरतात तो भाग वेगळा. पण आठवण करून दिली, की न चिडता देतात, हीदेखील प्रकाशक या संस्थेला पुष्कळच कलंक लावणारी बाब होय. प्रकाशकाच्या चेहऱ्यावर हव्या असणाऱ्या गांभीर्याचा अभाव आणि संपादकाच्या चेहऱ्यावर हव्या असणाऱ्या खत्रुडपणाचा अभाव या दोन गोष्टींवर मात्र रसिक मालकांना पुष्कळच काम करावे लागेल असे दिसते. बाकी आपल्या आजूबाजूच्या लेखकांना (विशेषतः लेखिकांना-कवयित्रींना) 'रसिक' करून सोडण्याचा विडा त्यांनी उचलला आहे आणि हा विडा दिवसेंदिवस रंगत चालला आहे, हेही आम्हास दिसते आहे. त्यांच्या केवळ स्मरणानेच आमच्यासारखा लेखकही अंमळ 'रसिक' होऊ घातला आहे, हे या ठिकाणी नम्रपणे नमूद करावेसे वाटते.
पेठेतल्या या रसिकाप्रमाणेच आणखी एका 'रसिका'चे पुस्तकप्रेम आम्हाला कायमच मोहवून टाकते. पुण्यनगरीच्या हृदयस्थानातून जाणाऱ्या बाजीराव रस्त्यावर या रसिक दाम्पत्याने अक्षरांच्या धारांचा जो वर्षाव आम्हावर चालविला आहे, तो केवळ अद्भुत होय. 'रसिक'मध्ये केवळ मालकच गुहेत बसतात; तर यांनी आपल्या 'नकादु'चीच आख्खी गुहा करून टाकली आहे. या गुहेत रिक्त पावली जाणारा माणूस बाहेर येताना मात्र जड पावलांनी येतो. (एक तर पुस्तकांची जड पिशवी त्याच्या हाती असते आणि दुसरं, हे एवढं सुंदर दालन सोडून जायचं त्याच्या जीवावर आलेलं असतं.) इथं पुस्तकांचे मालक आणि मालकीण दोघेही आपल्याला भेटतात. मालकीणबाई 'रसिका' असल्या आणि गप्पिष्ट असल्या, तरी मालकही काही कमी रसिक नाहीत. पण ते नेहमीच मोजकं, पण महत्त्वाचं बोलतात. गावोगावी ग्रंथप्रदर्शनं लावून राज्यात सर्वत्र पुस्तकांची वर्दी देणारे आणि त्या पुस्तकांसाठी दर्दींची गर्दी गोळा करणारे हे मालक म्हणजे थोरच! यांच्याकडं तुम्ही कुठलंही पुस्तक मागा, शंभर टक्के मिळणारच. शिवाय त्यांची ही गुहाही अत्याधुनिक. वेगवेगळे सुटसुटीत विभाग, मंद संगीत आणि मदतीला तत्पर असा त्यांचा सेवकवर्ग अशा वातावरणात दोन पुस्तकांची खरेदी जास्तच होते, हे सांगायला नको. आम्हाला एकदा यांच्या गुहेत आमचं एक पुस्तक दिसलं आणि जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. पुस्तकांच्या प्रचारासाठी, प्रसारासाठी दोघंही कायम झटत असतात. स्नेहपूर्ण वागण्यानं लोकांना जोडून ठेवतात. अंगणात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात. (आम्हाला बोलवतो, बोलवतो म्हणतात आणि बोलवत नाहीत. तर ते एक असो मेलं!) साहित्य संमेलनात यांचा स्टॉलही भला मोठा असतो आणि तिथं उसळणारी गर्दी त्यांच्या 'ब्रँड'ची महती सांगून जाते. मध्यंतरी मालक बंधूंपैकी 'राम' आणि 'लक्ष्मण' वेगळे झाले खरे; पण त्यामुळं गावात आता पुस्तकाचं आणखी एक दुकान झालं, या आनंदानं आम्हाला 'भरत', आपलं भरतं आलं होतं. तेही बंधू शब्दांच्या अंगणातच बागडत आहेत. तेदेखील साक्षात साहित्याच्या हेडक्वार्टरला शब्दशः डोक्यावर घेऊन! आहे की नाही कमाल!! खरंच, या घराला पुस्तकांपासून दूर करणं अशक्य आहे. पुणेकरांचा आणि त्यांचा जिव्हाळाही खासच आहे. आपल्या पुस्तकाच्या दुकानासमोरच परत वेगळं पुस्तकांचं प्रदर्शन लावणं हा उद्योगही हेच लोक करू जाणे. त्यांचं ते प्रदर्शन म्हणजे पुणेकरांना पर्वणीच असते. भरपूर पुस्तकं विकतात, भरपूर सवलती देतात, तरी भरपूर फायदाही कमावतात. धंद्याचं गणित चोख जमलेलं आहे. उभयपक्षी फायद्याचा सौदा असतो! यांच्या गुहेत जावं आणि बाहेर येऊच नये असं आम्हाला पुष्कळ वाटतं. पण ते शक्य नाही. मग आम्ही स्वप्नात तसली गुहा आणतो आणि गुहेचा एक कोपरा गाठून आवडीचं पुस्तक वाचत तासंतास लोळत पडतो... 
अलीकडं या दोन्ही मालकांनी आणि त्यांच्या पुण्यनगरीतल्या इतर सहकाऱ्यांनी 'वाचक जागर अभियान' राबवलं. गेल्या महिन्यात झालेल्या या उपक्रमांतर्गत झालेल्या विविध नावीन्यपूर्ण कार्यक्रमांनी वाचकांना भरभरून आनंद दिला. कुणी नामवंत कवीनं कविता म्हटल्या, कुणा संगीतकारानं गाणी म्हटली, कुणा साहित्यिकानं शब्दांची मैफल रंगविली. एकूण मज्जेचा माहौल तयार झाला होता. आमच्यासारख्या किंचित लेखकुलाही यातून बरंच काही मिळालं. पुस्तकांवर प्रेम करीत राहणारा समुदाय सतत चैतन्यशील राहणं किती गरजेचं आहे, हे लक्षात आलं. अनेकांना पुस्तकांची भूक असते, पण त्यांना पुस्तकांपर्यंत जायला वेळ असतोच असं नाही. अशा उपक्रमांतून हे वाचक पुस्तकांच्या दुकानी आले, त्यांनी पुस्तकं हाताळली, विकत घेतली हे दृश्य डोळं निववणारं होतं, हे निखालस! वाचकाकडं घेण्याची अपरंपार क्षमता आहे; आपण देण्यास सक्षम आहोत का, असा जरा अंतर्मुख इ. करणारा सवालही मनात उमटून गेला. मग यासाठी काय केलं पाहिजे? आमच्यासारख्या लेखकूंनी आधी भरपूर वाचलं पाहिजे, भरपूर पाहिलं पाहिजे, भरपूर ऐकलं पाहिजे, भरपूर काही 'आत' घेतलं पाहिजे... वरच्या मजल्याची पायरी वारंवार चढली पाहिजे, संपादकांबरोबर वाद-चर्चा रंगविल्या पाहिजेत... असं आम्हाला भरपूर काय काय वाटून गेलं. आम्हाला नेहमीच असं काय काय वाटत असतं. पण मूळ स्वभाव ‘ठोंब्या’ असल्यानं अंमलबजावणीच्या पातळीवर त्याचं काहीही होत नाही, हा भाग निराळा. तर ते असो. हे काय काय करायचं असेल, तर मालक-संपादकांकडचा चहा वारंवार प्यायला हवा, एवढं लक्षात आलं. अशी एखादी गोष्ट मनात आली, की आम्ही तातडीनं तिची अंमलबजावणी करून टाकतो. म्हणून आम्ही लगेच फोन उचलला... संपादक-मालक-प्रकाशकांचा (हे एकच गृहस्थ आहेत, बरं का!) नंबर फिरवला... विचारते जाहलो - ‘संपादक सर, येऊ काय चहाला?’
त्यावर संपादक उत्तरले - या की! आनंद आहे...
आम्ही - का बुवा?
सं.मा.प्र. - अहो, लेखक 'रसिक' जाहला...
संपादकांनीच आम्हास ‘रसिक’ घोषित करून टाकल्यानं आम्हास परमानंद जाहला... त्या आनंदातच आम्ही दिवाळी अंकांचे लेख पाडायला बैठक मारली...आता हे लेख आणि दिवाळी यात आमचा पुढला महिना सहजी निघून जाईल...
आता भेटू दिवाळी अंकानंतरच्या अंकात... पण कोणत्या ‘नकादु’त...???
वाट पाहा...

---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, सप्टेंबर २०१७)

---


पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

---

फिरकीचा ठोंब्या - भाग १४

पुस्तकांचं नकादु...
---------------------

पुस्तकांच्या दुकानात जायचे म्हटल्यावर आम्हाला भारी हसू येते. मनमज्जेच्या अनेक गोष्टी तिथं बघायला मिळतात. पुस्तकांव्यतिरिक्त किती तरी ज्ञानदायी प्रकार अनुभवता येतात. आम्ही किंचित लेखकू असल्यानं ग्रंथ आणि ग्रंथविक्रेते यांच्याशी आमचा ऋणानुबंध भलताच जुळला आहे. पुण्यनगरीत पुस्तकांच्या दुकानात जायचे म्हटले, की ते साधेसुधे काम नसते. त्यासाठी बरीच पूर्वतयारी करावी लागते. साधारणतः कर्जाचे तीन हप्ते चुकल्यानंतर देणेकऱ्याला सामोरे जात आहोत, असा भाव मनी आणावा लागतो. (विवाहित पुरुषांना हे फारसे कठीण जात नाही, एवढे बरीक खरे!) त्यातही ही खरेदी पुण्यनगरीत आणि अप्पा बळवंत चौक नामक इतिहासप्रसिद्ध जागेच्या भवताली करायची असल्यास चिकाटी, नम्रता, संयम, धैर्य आदी गुणांची कसोटीच लागते.
मागे एकदा असेच पुस्तक खरेदीच्या भयानक अनुभवावरून परतल्यानंतर अस्मादिकांनी त्याचे एक टिपण करून ठेविले होते. ते आज ऐतिहासिक दस्तावेज म्हणून प्रसिद्ध पावले आहे. या टिपणात दस्तुरखुद्दांनी म्हटले आहे, 'शेतकरी, कोपऱ्यावरचा किराणा दुकानदार, पेपरवाले म्हणजे पत्रकार आणि पुस्तकविक्रेता यांच्यात काय साम्य आहे? तर या लोकांना कुणी सुखी पाहिलं आहे काय? म्हणजे लोकांना जरी ते वरकरणी सुखी दिसत असले, तरी ते लोक स्वतःला सुखी मानतात काय? कधीही नाही! यातला पुस्तकविक्रेता नामक घटक आहे तो तर कायम दुःखाच्या गर्तेत तरंगत असतो. (आणि हे त्याचं स्वतःचंच मत असतं.) पुस्तकं खपत नाहीत, पैसे मिळत नाहीत, लोक उधारी देत नाहीत, फुकट पुस्तकं नेतात, या आणि अशा अनेक कारणांमुळं पुस्तकविक्रेत्याच्या चेहऱ्यावर कायम प्रूफरीडिंग न झालेल्या पानाची कळा असते. आपल्या दुकानातल्या वरच्या शेल्फांवर वर्षानुवर्षं धूळ खात पडलेली पुस्तकं आणि आपण स्वतः यांत बरंचसं साम्य आहे, अशी पुस्तक विक्रेते महोदयांची प्रामाणिक समजूत असते. समाजरूपी दुकानात आपणही असेच धूळ खात पडलेले आहोत आणि उपेक्षेशिवाय अन्य काहीही (क)मिशन वाट्याला आलेलं नाही, अशा धारणेचं घट्ट बाइंडिंग त्यांच्या मनावर असतं. फार पुस्तकं खपली, तर समाज अचानक ज्ञानी वगैरे होईल आणि आपला कायमचा बाजार उठेल, अशा (निरर्थक) भीतीची एक तळटीप त्याच्या मनाच्या पानावर कायमची कोरून ठेवलेली असते. त्यामुळं होता होईल तो निरिच्छ आणि वैराग्य वृत्ती अंगी बाणवून, पुस्तक विकत घ्यायला आलेल्या ग्राहकरूपी देवाला या मोहमायेपासून वंचित करणं हे आपलं आद्य कर्तव्य असल्यासारखाच त्याचा दुकानातील वावर असतो. ग्राहक वेळी-अवेळी कधीही दुकानात येऊन पुस्तकं मागतात; तरीही आपण हा त्रास सहन करून त्यांची मोठीच सेवा करतो, असे भाव चेहऱ्यावर नसतील, तर पुस्तकाच्या दुकानाचा परवाना सरकार देणारच नाही, अशी या 'गब्बरग्रंथी' मंडळींची खात्रीच असावी... '
हे वाचल्यावर एवढ्या जीवावरच्या प्रसंगावर बेतून घ्यायला आम्ही कशाला त्या चौकात तडमडलो होतो, याचं राहून राहून आश्चर्य वाटतं. पण हा लेखनाचा किडाच भयंकर! तो चावल्यावर माणूस वेड्यासारखा वागू लागतो. आम्हीही त्यास अपवाद नाही. एवढं सगळं होऊनही पुस्तकांच्या दुकानांची पायरी चढतोच चढतो. फक्त यंदा स्पॉट बदलला. कोथरूडमध्ये पुस्तकांचं दुकान सुरू झाल्याची खबर लागली. वास्तविक कोथरूड हे पुण्याचं नाक. समस्त कोथरूडकर म्हणजे 'जरा अधिक पुणेकर'... असं असूनही कोथरूडमध्ये पुस्तकाचं दुकान नव्हतं, हे काही झेपत नाही. हे म्हणजे पैठणी आहे, पण नथ नाही किंवा कोट आहे, पण टाय नाही किंवा मसापचा मेंबर आहे, पण मतदानाचा अधिकार नाही असला काही तरी प्रकार झाला. पण अखेर वाचन धर्म वाचविण्यासाठी मराठीतल्या 'साहित्यसंभां'नी स्वतः पुस्तकाचं दुकान सुरू केलं आणि आम्ही कोथरूडवासीयांसोबत त्यांचा जयजयकार करून टाकला. वास्तविक कोथरूड ही पुस्तकांसाठीची 'आयडियल' जागा; पण तिथं असं पुस्तकांचं दुकान सुरू करावं ही 'आयडिया' फक्त साहित्यसंभांनाच सुचली. शिवाय कोथरूडच्या प्रतिष्ठेला साजेसं असं त्यांनी या दुकानाचं नावही ठेवलं - पुस्तक पेठ. (भले ते एका इमारतीच्या गाळ्यातलं दुकान का असेना, पण नाव 'पेठ'! पुण्यातल्या गल्लीबोळातली संस्थाही जशी 'अखिल भारतीय' असते, तसंच हेही!) साहित्यसंभांच्या जोडीला इथं माधवरावही आहेत. 'तोच पार्टनर साक्षात मानावा, भांडवल देतो निमित्त केवळ' असं गाणंही साहित्यसंभा आपल्या माधव'स्वामीं'साठी गुणगुणत असतात म्हणे.

अशा या दुकानी जाण्याचा योग अखेर आला. साक्षात साहित्यसंभांनी गळामिठी घालून आमचं स्वागत केलं. (या अनोख्या दृश्याचं छायाचित्र कुणीच न टिपल्यानं पुढं इतिहासात अजरामर होण्याचा आमचा चान्स हुकला आहे.) दुकानी आलेल्या प्रत्येकाचं स्वागत मालक असंच करतात काय, या विचारानं मागोमाग आलेल्या दोन मैत्रिणी सचिंत झाल्या; पण तसं काही घडलं नाही. त्यांनी हुश्श केलं आणि आम्हीही! बाकी 'पुस्तक पेठ' होती झक्कास बरं का! त्या छोट्याशाच दुकानाचं, नीटनेटकं, गोंडस रूपडं पाहून आम्ही हरखून गेलो. प्रत्येक लेखकाचा वेगळा कप्पा, सुबक अक्षरात लिहिलेली नावं, नामवंत लेखकांचे कोट्स वर दोन्ही बाजूंना अतिसुंदर अक्षरांत लावलेले, समोर मध्यभागी मराठी सारस्वतातल्या नक्षत्रांच्या चित्रांचा करून लावलेला कोलाज... हे पाहून छानच वाटलं. आम्ही पुस्तकं पाहू लागलो तो साक्षात मालक आमच्यासोबत येऊ लागले. 'हे बघितलं का, ते घेतलं का, हे वाच, हे असूच दे' अशी धावती कॉमेंटरी करीत ते आमचा शब्दशः पिच्छा पुरवू लागले. दुसरे मालक गल्ला सांभाळत होते, तर हे उत्साही मालक पेठेच्या आतल्या गल्ल्या सांभाळत होते. दोन पुस्तकांच्या रॅकमध्ये मालकांनी आम्हाला खिंडीत गाठावे तसे गाठले होते. 'हे वाचलं का, ते वाचलं का,' या त्यांच्या साध्या प्रश्नांची उत्तरं नकारार्थीच येत गेली, तशी आमची पुस्तकवेडाची वस्त्रं गळून पडायला लागली. आपण वाचनाच्या बाबतीत अगदीच 'हे' आहोत, असा फील आला. मालकांनी मग आम्हाला आतल्या इंग्रजी दालनात खेचलं, तेव्हा हारुकी मुराकामी वगैरे शब्द ऐकल्यावर आपण ही 'हाराकिरी'च केल्याचं आमचं मत पक्कं झालं. मालकांचं वाचन त्यांच्यासारखंच दांडगं होतं, हे आम्हाला ठाऊक होतं. पण ते एवढ्या जातीनं आमच्या पुस्तकखरेदीत लक्ष घालतील ही अपेक्षा नव्हती. खऱ्या पेठेतल्या ग्रंथविक्रेत्यांच्या तुसडेपणाचा अनुभव घेतलेल्या आम्हाला पेठकर मालकांनी अक्षरशः गहिवर आणला. पुढं हळूच त्यांनी त्यांच्या वाचक सभासद योजना, वार्षिक वर्गणी वगैरे स्किमा पुढं सरकावल्यावर त्यांच्यातल्या चाणाक्ष विक्रेत्याचीही गाठ पडली. अखेर होय-नाही करता करता चार आकडी रकमेची खरेदी झालीच. वाचकाला हवी ती पुस्तकं आणून देणारा, सुवाच्य अक्षरात स्वतः बिलं फाडणारा, वर भरघोस सवलत देणारा हा मालक म्हणजे पुण्यातल्या ग्रंथविक्रेता जगतास कलंक आहे, असं क्षणभर वाटून गेलं. यानंतर 'जिस का मुझे था इंतजार, वो घडी आ गयी...' मालकांनी आम्हाला पुस्तक पेठेच्या कॉर्नरला खेचलं आणि दणादणा फोटो काढून घेतले. मग सेल्फ्यांचीही आवर्तनं झाली. आता हे फोटो फेसबुकवर पेठेच्या पानावर अपलोड होणार आणि साहित्यसंभांच्या विशाल वर्तुळात आपण झळकणार याचा आम्हास पेठभर, आपलं, पोटभर आनंद जाहला. आता आम्हीही काही काळ त्यांच्या सहवासात काढल्यानंतर बाहेर पडताना आम्हालाही पुस्तकविक्रीच्या काहीबाही योजना सुचू लागल्या. मालक आमच्या मैत्रिणीचे प्रेमानं फोटो काढू लागल्यावर आम्हाला मंगळागौरीची स्कीम सुचली. संक्रांतीच्या वा चैत्रगौरीच्या हळदी-कुंकवाचं आणि काही विशिष्ट कवितासंग्रहांच्या खपाचं नातं आम्हाला अचानक उलगडलं. बाकी काही असो, साहित्यसंभांनी कोथरूडमध्ये उभारलेली ही पुस्तकपेठ आमच्या मनाला उभारी देऊन गेली, हे नक्की. आनंदात तरंगतच आम्ही घरी आलो...
माणूस कुठल्याही कारणानं आनंदी झाला, की त्याचा सारासार विवेक गहाण पडतो. एखाद्या अनुभवानंतर सगळं जगच चांगलं आहे, असा गैरसमज तो करून घेतो. आमचंही तसंच झालं. कुठल्या तरी अस्फुट, निसटत्या क्षणी आम्ही अन्य पुस्तक दुकानांत जाण्याचा निर्धार केला. मग आम्ही पुनश्च पारंपरिक वळणाच्या एका दुकानात आणि किती तरी वर्षांची परंपरा इ. असलेल्या दुकानी शिरलो. तेथे आम्ही एक विविक्षित पुस्तक मागताच, त्यांनी आत्ता ते नाही, असं सांगितलं. मग ते तुमच्याच प्रकाशनाचं आहे, असं सांगितल्यावर 'होय का, असं सांगा की' म्हणत तो स्थितप्रज्ञ इसम आत गेला. आता पुस्तक लगेच सापडलं. या पुस्तकावर सवलतही मिळाली. पुढे आणखी एका दुकानी गेलो असता, काउंटरवरल्या महिलेशी एन्काउंटर होण्याचा प्रसंग आला. आम्ही मागितलेले एक विविक्षित पुस्तक पाहिल्यावर तिने आम्ही तिची इस्टेट लिहून मागत असल्यासारखा चेहरा केला. नंतर तिला एकूणच काही न झेपल्यामुळं आतून एक ज्येष्ठ काका आले. त्यांनी ते पुस्तक 'औट ऑफ प्रिंट' असल्याचे सांगून आम्हाला एक वही देऊ केली. त्या वहीत आम्हीच पुस्तकाचे नाव, प्रकाशन, मोबाइल नंबर इ. तपशील भरून दिला. पुस्तक आलं, की लगेच फोन करू, हे त्या काउंटरसुंदरीनं सांगितलं. आजतागायत काही फोन आलेला नाही. त्यानंतर 'औट ऑफ प्रिंट' म्हणजे आपल्या दुकानात नसलेले पुस्तक अशी एक नवी व्याख्या आम्ही मनात तयार केली आहे.
बाकी जिमखान्यावरचे आमचे आणखी एक आवडते दुकान म्हणजे 'इंटरनॅशनल'! आमचेच कशाला, पुण्यातल्या तमाम जाणत्या वाचकांचं एके काळचं हे हक्काचं पुस्तक दुकान होतं. आता दीक्षितांच्या 'इंटरनॅशनल'चं जोगळेकरांचं 'बुकगंगा इंटरनॅशनल' झालंय. पण खरं सांगायचं, तर या बदलामुळं मूळचं दुकान अजूनच गोजिरं-साजिरं झालंय. शांत-निवांतपणे पुस्तकं घेण्याचा, न्याहाळण्याचा, हाताळण्याचा आनंद इथं मिळतो. इथला स्टाफही चांगला आहे. तो आपल्याला कुठल्याही सूचना किंवा 'हे घ्या, ते ठेवा' करीत नाही आणि मागं-मागंही येत नाही. शिवाय इथं वर बसून पुस्तकं वाचायचीही सोय आहे. अडचण एकच. इथं समोर पार्किंगची सोय नाही. त्यामुळं मागच्या गल्लीत गाडी लावून पुढं दुकानात यावं लागतं. तेव्हा अक्षरशः 'रस्त्यावर आल्याचा' फील येतो. अर्थात इथं तशीही भरपूर खरेदी केली जाते. त्यामुळं खिसा रिकामा झाल्यानं आपण त्याही अर्थानं 'रस्त्यावर' येतोच! या पुस्तकाच्या दुकानाचे मालक भलतेच मितभाषी, सुस्वभावी इ. आहेत. ते दुकानात कधीही भेटत नाहीत. त्यांना भेटायचं तर खास अपॉइंटमेंट वगैरे घेऊन जावं लागतं. त्यांच्या गोड बोलण्यामुळं त्यांच्याशी बोलताना पुणेरी फटकळपणा बाजूला ठेवून नम्रतेनं बोलणं अंमळ कठीणच जातं. (अर्थात असं असलं, तरी बाकी व्यवहारात मालक चोख आणि अस्सल कोकणी बाण्याचे आहेत, याची नोंद घ्यावी.) त्यांना भेटून आम्हाला कायमच अंगावर मूठभर मांस चढल्यासारखं वाटतं. म्हणून डाएटवर असताना आम्ही 'बुकगंगा' भेट टाळतोच. पुस्तकप्रेमींच्या डोक्यावर यांनी धरलेली ही प्रेमाची गंगा अविरत वाहती राहावी, असं मात्र वाटून जातं.
पुण्याच्या अस्सल पुणेरी बाणा जपणाऱ्या ग्रंथविक्रेत्यांच्या लौकिकाला ही दोन दुकानं कलंक फासताहेत, असं आमचं स्पष्ट मत झालं आहे. आता आणखी काही 'रसिक' दुकानांत जाऊन, 'अक्षरधारां'मध्ये न्हाऊन, हा लौकिक राहिलाय की नाही, हे आम्हाला बघावंच लागणार आहे.... लेखकास तिकडंही जाऊन यावे लागेल... तो वृत्तांत लगोलग येईलच...!

----

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, ऑगस्ट २०१७)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----

फिरकीचा ठोंब्या - भाग १३

पुस्तकांच्या गावा जावे...
----------------------------

आम्ही स्वतःला एक किंचित लेखकू म्हणवून घेत असल्यानं त्याच्यासंबंधानं आमची अशी काही कर्तव्ये आहेत. साहित्यविषयक कुठेही काही घडत असल्यास तिथं जाऊन हजेरी नोंदवून येणं हेही त्यापैकीच एक कर्तव्य होय. आमच्या या आग्रहामुळं एकदा 'येथे अंत्यविधीचे साहित्य मिळेल' या पाटीतील केवळ 'साहित्य' शब्द पाहून आम्ही आत जाऊन पुस्तकांची चौकशी केली होती आणि तो शेवटला विधी तिथेच आमच्यावर शेकण्याची वेळ आली होती. एकदा स्त्री-साहित्य संमेलनातही केवळ 'साहित्य' शब्दाच्या आधारे घुसण्याचा आमचा प्रयत्न असाच अंगलट आला होता आणि पुढील कित्येक दिवस घरच्या स्त्रीकडून अस्मादिकांची यथेच्छ धुलाई झाली होती. तेव्हा आमचे साहित्यप्रेम हे तसे धोकादायक आहे. अनेकदा ते आमच्या जीवावर बेतते. तरीही साहित्यसेवा करण्यासाठीच आपला जन्म झाला आहे, अशी आमची नम्र धारणा असल्यानं आम्ही ते प्रसंग कसेबसे निभावून नेतो आणि पुढल्या सेवेला उभे राहतो. तर ते असो. मुद्दा आमच्या अविचल साहित्यनिष्ठेचा आहे आणि यंदाही आम्ही तो निभावून नेला आहे. त्याचे झाले असे...
महाराष्ट्रदेशी सत्तापालट होऊन काहीच्या काही थोर साहित्यिक नेते सत्तेवर आल्याचे चित्र आम्ही गेली दोन-तीन वर्षे पाहत आहोत. यातील मराठी भाषेच्या मंत्र्यांचे नावच 'विनोद' असल्याने आम्ही पहिल्यापासून त्यांच्या एकतर्फी प्रेमातच पडलो आहो. विनोद हा आमचा स्थायीभाव आहे, विनोद हा आमच्या लेखनाचा प्राणवायू आहे, विनोद हाच आमच्या साहित्याचा स्वभाव आहे. तेव्हा मराठी भाषेचे मंत्रिपदच 'विनोदा'कडे गेले, तेव्हा आम्हास अत्यंत हर्ष होऊन गुदगुल्या इ. झाल्या. वास्तविक मराठी साहित्यात मुख्यमंत्रिपदाचा मान विनोदाला मिळायला हवा. मात्र, विनोदाला कोणीही गंभीरपणे घेत नसल्याने त्याचा हा मान हुकला आहे, हे आमचे पहिल्यापासूनचे मत्त आहे. गंभीर, जडबंबाळ कादंबऱ्या किंवा आत्मलेखनाला गृह, महसूल आदी खाती मिळत असताना विनोदाला मात्र शालेय शिक्षण किंवा भाषा आदी दुय्यम खाती दिली जातात, हे चित्र साहित्य मंत्रिमंडळाला अगदीच शोभत नाही. तरीही आम्ही विनोदप्रिय असल्यानं केवळ हसून या गोष्टी दुर्लक्षित केल्या आहेत, हे इतरांनी समजून असलेले बरे. तरी मराठी भाषेच्या प्रेमात पडलेल्या आमच्या विनोदनामे मंत्र्यांनी महाराष्ट्रदेशी पुस्तकांचा गाव उभारण्याची घोषणा केली, हे वाचून तर आम्ही आनंदाने वेडेपिसे झालो. त्याच रात्री आम्ही पुस्तकांच्या गावाचे स्वप्न आम्हास पाडून घेतले. कुठल्याही गोष्टीत विलंब आम्हाला खपत नाही. त्याच दिवशी दुपारी आम्ही 'हे ऑन वे' या ब्रिटनमधल्या पुस्तकांच्या गावाविषयी वाचले होते. तिथं प्रत्यक्षात जाण्याएवढे आम्ही 'हे' नसल्यानं स्वप्नातच जाणे इष्ट होते. शिवाय ते 'हे' 'ऑन द वे'च असल्याचेही कळले होते. तेव्हा जाता जाता तिथे जाणे सहजशक्य होते. स्वप्नात ते भारी गाव पाहिल्यानंतर आता महाराष्ट्रातही तसेच गाव उभे राहणार, या कल्पनेनं जीव फारच आनंदित झाला.
अखेर तो दिवस उजाडला. महाराष्ट्रात महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन स्वर्गीय ठिकाणांच्या मधोमध असलेल्या भिलार या गावी पुस्तकांचे गाव उभे राहणार असल्याची मंत्रिमहोदयांची घोषणा आम्ही ऐकली आणि आम्हाला आनंदाने गगन ठेंगणे झाले. महाबळेश्वर हा आमचा सुरुवातीपासून वीक पॉइंट. (आम्ही आमच्या एका मित्राला हे सांगितल्यानंतर तो पहिल्यांदा महाबळेश्वरास गेला, तेव्हा हा पॉइंट शोधत फिरला होता म्हणे. नंतर तो शासकीय कोशात गेला, हे सांगणे न लगे!) महाबळेश्वर म्हणजे मध्यमवर्गीय हनीमूनीयांची काशी! खऱ्या काशीच्या मोक्षाला पोचण्यासाठीचे 'काम' या पर्यटनस्थळापासून सुरू होते. महाबळेश्वर रंभा असेल, तर पाचगणी ऊर्वशी आहे; महाबळेश्वर नरेंद्र असेल, तर पाचगणी देवेंद्र आहे. (आणि भिलार अर्थातच विनोद!) महाबळेश्वर स्वित्झर्लंड असेल, तर पाचगणी माँटे कार्लो आहे. महाबळेश्वर 'हे' असेल तर पाचगणी 'ते' आहे. (आणि भिलार हे ते 'हे ऑन (द) वे' आहे!) असो. अत्यंत आनंदित झालेला आणि काही विशिष्ट पेये प्राशून उंचीवर गेलेला माणूस साधारण असेच बाष्कळ बडबडतो. भिलारला पुस्तकांचे गाव होणार, या कल्पनेनंच आम्हाला एवढा आनंद होत असेल, तर प्रत्यक्ष तिथं गेल्यावर काय होईल या विचारानं आम्ही लगेचच त्या गावाला जायचं टाळलं. पण साहित्यविषयक कर्तव्य अपूर्ण राहिल्याची बोच मनाला लागून राहिली होती.
अखेर तो योग आला. भिलारला पुस्तकांचं गाव सुरू झाल्या झाल्या तेथे जाऊ नये, असे आमचे मत होते. त्यामुळं आम्ही काही दिवस कळ सोसली. पण फार दिवस दम धरवेना. अखेर एके दिवशी आम्ही पुस्तकांच्या गावाकडं निघालो. पुस्तकांच्या गावी गेल्यावर होणारा अतीव आनंद आपल्याला सोसवेल का, अशा शंकेनं आम्ही बीपीच्या गोळ्या जवळ ठेवल्या. वाई फाट्याला 'पुस्तकांच्या गावात स्वागत' वगैरे बोर्ड वाचून मन आनंदाच्या अंतराळात तरंगू लागले. मराठी सारस्वताच्या दरबारातील एक फार मोठी उणीव आता दूर झाली आहे, या कल्पनेनं मन वाईच हरखून गेलं. वाईला गणपतीला नमस्कार करून आणि तिथल्या विश्वकोश कार्यालयाला अन् प्राज्ञपाठशाळेला दुरूनच वंदन करून आम्ही पसरणीचा घाट चढायला सुरुवात केली. मराठी साहित्यविश्वात पसरलेल्या अगणित थोर्थोर साहित्यिकांची याद येऊन आमचे मन हळवे झाले. त्यात महाबळेश्वरच्या बिनअध्यक्षांच्या संमेलनाची आठवण येऊन मन घाबरे झाले. गाभाऱ्यात देव नसताना पुजाऱ्यांनी बडवलेल्या घंटा ऐकू आल्या. अत्रे-फडके वादापासूनचे सगळे वाद-प्रतिवाद आठवले. आणीबाणीतली मुस्कटदाबी आणि त्यानंतरचा 'दुर्गावतार' आठवला. उधळलेली संमेलनं, पडद्याआडची कारस्थानं, मंडपातली उणी-दुणी, साहित्यघाटावरची बेशरम धुणी... सगळं सगळं आठवलं. विद्रोहाची वेगळी चूल आठवली, ग्रामीण हुंकाराची भूल आठवली, स्त्री-साहित्याची वेदना आठवली, बालांसाठीची संवेदना आठवली... केशवसुतांची 'तुतारी' आठवली, कोलटकरांची 'भिजकी वही' आठवली... पाडगावकरांची बोलगाणी आठवली... ढसाळांची XX वाणी आठवली... दया पवारांचं बलुतं आठवलं अन् बोकिलांची 'शाळा'ही मनात हुरहुरती घंटा वाजवून गेली.
या सगळ्या साहित्याला आता कायमचं, हक्काचं छप्पर मिळालंय या जाणिवेनं मन भरून आलं. आमची गाडी पाचगणीतली गर्दी सोडून पुढं निघाली. आम्ही आता एका वेगळ्याच उंचीवर पोचल्याची जाणीव भर्रार वाहणारा वारा कानाला करून देत होता. डाव्या बाजूला टेबललँडचं पठार आणि उजव्या बाजूच्या खोल खोल दऱ्या पाहून आम्ही पुन्हा साहित्यस्मरणरंजनात शिरलो. टेबललँडचं पठार म्हणजे लोकप्रिय कथा-कादंबऱ्याच जणू! टेबललँडच्या पठारावर पर्यटकांची गर्दी असते, तशीच या कथा-कादंबऱ्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी सर्वत्र असते. या कथा-कादंबऱ्या लिहिणारे लेखक अर्थातच लोकप्रिय असतात. त्यांचं जवळपास दैवतीकरण झालेलं असतं. त्या टेबललँडच्या पठारावर माणसं फक्त मजा करायला येतात. तिथं असलेल्या मज्जेच्या साधनांचा कुणी भाव करत बसत नाही. 'मूँह माँगी' किंमत मिळते. तसंच या लोकप्रिय कथा-कादंबऱ्यांचं असतं. दुसरीकडं उजव्या बाजूला असलेल्या खोल खोल दऱ्यांसारखं सखोल अर्थ वगैरे सामावणारं, पण गूढगर्भ साहित्य त्या दऱ्यांइतकंच निर्जन राहतं. त्या अवघड वाटेनं खाली उतरायचं धैर्य फारच कमी जणांकडं असतं. पण या दऱ्यांच्या पाठीवरच पठारं वसलेली असतात, हे अनेकदा आपल्या लक्षात येत नाही.
आम्ही पाचगणीच्या उंचीवर आल्यानं आणि तिथला उंची वारा कानात शिरल्यानं सैराटलो होतो आणि काहीच्या काही विचार मनात येऊ लागले होते, हे एकदम आमच्या लक्षात आलं. आमच्या बौद्धिक वकुबाच्या हिशेबानं हा डोस जास्त झाला होता. अजून तर आख्खं पुस्तकांचं गाव पाहायचं होतं. त्यामुळं आम्ही हे पठारी चिंतन तत्काळ आवरतं घेतलं आणि आजूबाजूच्या मौजेच्या चिजा न्याहाळू लागलो. घटकेत आमची गाडी भिलार फाट्याला आली. डाव्या बाजूला गेलं, की एक-दीड किलोमीटरवर लगेच आमचं पुस्तकांचं गाव येणार होतं. पाचच मिनिटांत आम्ही तिथं पोचलो. वास्तविक इतर चार गावांसारखंच हे गाव दिसत होतं. मग त्याला 'पुस्तकांचं गाव' का म्हणायचं, हा प्रश्न आम्हाला पडला. पण पुढं गेल्यावर लगेच उत्तर मिळालं. रस्त्याच्या दुतर्फा 'कथा', 'स्त्री-साहित्य', 'बाल-साहित्य' अशा पाट्या होत्या. इथल्या लोकांच्या घरातच सरकारनं पुस्तकं वाचायची सोय केली होती. बाहेरून त्या खोलीत जाता यावं, अशी रचना केली होती. पुस्तकांच्या नावाखाली कुणीही कुठल्याही घरात शिरू नये, यासाठी सगळीकडं पाट्या लावल्या होत्या, याचा आम्हाला आनंद झाला. शिवाय पुस्तकं तिथं बसूनच वाचायची होती. पुस्तक वाचत वाचत रस्त्यानं फिरायला परवानगी नव्हती. नाही तर स्त्री-साहित्यवाले आणि पुरुष साहित्यवाले कधी बाल-साहित्याच्या घरात घुसले असते, सांगता आलं नसतं. थोडक्यात, सगळीकडं बसून वाचण्याची नीटच व्यवस्था होती. आम्ही स्वतः सरपंच म्याडमच्या घरात बसून एक कथा व्यवस्थित वाचली. (त्यांच्याकडं 'कथा' विभाग होता.) ती कथा वाचल्यावर कुठं आम्हाला 'पुस्तकांच्या गावी' आल्याचा फील आला.
आता आम्हाला गावची सहल करायचा उत्साह आला. शाळेत गेलो. लहान लहान लेकरं गोष्टींची पुस्तकं घेऊन वाचत बसलेली बघून ऊर भरून आला. समोरच सानेगुरुजींचा फोटो दिसला. आता रडूच फुटणार होतं. तेवढ्यात एका सरांनी हाक मारली आणि आम्ही भानावर आलो. मग मुलांसमोर कथाकथनाचा कार्यक्रम करून झाला. आमच्यापेक्षा मुलांनीच छान गोष्टी वाचल्या, हे सांगायला नकोच. मात्र, 'मुलांमध्ये मूल' इ. होता आल्यानं एक बालिश आनंद झाला. फळ्यावर साहित्यिकांची नावं लिहिली होती. त्यात 'पांडुरंग सदाशिव साने'मधला 'सदाशिव' हा शब्द 'सदाशीव' असा लिहिलेला बघून 'शीव शीव' म्हणावंसं वाटलं. 'केशवसुतां'मधला 'सु' दीर्घ लिहिल्यानं मराठीच्या नाकासमोरच सूत धरायची वेळ येते की काय, असं वाटून गेलं. तिथल्या गुर्जींना कानात योग्य तो संदेश दिला आणि निघालो.
तिथून मग साहित्यप्रकारांतली अन्य दालने बघितली. आमच्यासारखेच काही उत्साही पर्यटक इकडं-तिकडं हिंडत होते. सगळे काही मराठी नव्हते. काही परप्रांतीयही होते. त्यांच्या आवडीची पुस्तकं तिथं नव्हती आणि स्ट्रॉबेरीचा सीझनही संपला होता. त्यामुळं त्यांना भिलभिलारल्यासारखं झालं. आम्ही भिलारे गुरुजींची भेट घ्यायला गेलो, पण ते नव्हते. मग इतर काही दालनं बघून आलो. सगळीकडं बसायला उत्तम व्यवस्था, पुस्तकांच्या भरपूर रॅक आणि नवीकोरी पुस्तकं सरकारनं स्वतः विकत घेऊन इथं आणून ठेवलेली दिसली. नंतर प्रकल्प कार्यालयाला भेट दिली. तिथल्या मंडळींचा उत्साह पाहून बरं वाटलं.
एकूणच भिलारच्या त्या उंचीवर थंडगार वाऱ्यात प्रसन्न वाटत होतं. आपल्या आवडीचं पुस्तक घेऊन, तंगड्या पसरून जगाच्या अंतापर्यंत आपण इथं वाचत बसू शकतो, असं वाटलं. पुस्तकांच्या गावात जाऊन यापेक्षा दुसरं काय वाटायला हवं? ज्यांनी आयुष्यात कधी हाती पुस्तकच धरलं नाही, ते लोक पर्यटक म्हणून आले आणि यानिमित्तानं त्यांना हा गोड छंद जडला, तर त्याहून चांगली गोष्ट काय असेल?
भिलारहून परतताना मन आत्मिक आनंदानं भरून आलं. पुस्तकांच्या गावाचा हा प्रयोग अद्याप बाल्यावस्थेतच असला, तरी त्याला अजून सरकारीपणाची तुसडी किनार नाही, हे बघून बरंच वाटलं. आपल्याकडं कुठल्याही सरकारी प्रयोगाला, यंत्रणेला नावं ठेवायची फॅशन आहे. आम्हाला तरी लगेच तसं काही करावंसं वाटलं नाही. कारण यातून झालं, तर काही तरी चांगलंच होईल; नाही तर सध्या आहे ते आहेच...
घाट उतरताना मन नव्या कोऱ्या पुस्तकांच्या त्या वेडावून टाकणाऱ्या वासात अडकलं होतं... आणि हा खरंच 'विनोद' नव्हता!

---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, जुलै २०१७)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

---

फिरकीचा ठोंब्या - भाग १२

पत्तनीय अन् उत्तरीय...
---------------------------

मे महिन्याच्या ऐन उकाड्यात आम्ही प्रतिभासाधनेचा यत्न करीत आहोत. वास्तविक आमरस-पुरी खाऊन, एसी २० वर ठेवून किंवा पंखा पाचवर ठेवून गारेगार झोपायचे हे दिवस! परंतु आम्ही स्वतःस 'आम' लेखक समजत नसल्यानं आमचं काही तरी वेगळंच सुरू असतं. मागल्या महिन्यात लेख 'बनविण्या'च्या संकटातून आमची सुटका झाली खरी; तोवर हे प्रमाण आणि बोलीचं भांडण समोर येऊन ठाकलं. आमच्यासारख्या लेखकूची जी काही उरलीसुरली प्रतिभा आहे, ती या भांडणात मातीमोल होईल आणि वाचकांना अस्सल मातीतला लेख वाचायला मिळेल, अशा आशेनं आम्ही याही विषयाला हात घातला. 'हात घालीन तिथं माती' हा आमचा लौकिक असल्यानं प्रमाण आणि बोलीच्या भांडणात आपली स्वतःचीच माती होणार, याविषयी आमची पूर्ण खातरी झाली होती. तरी लेखकू म्हणून अंगी आडमाप उत्साह असल्यानं आम्ही या दोन्ही बोल्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली.
वास्तविक प्रमाण मराठीला 'बोली' म्हणणं हा तिचा अपमान आहे. हे म्हणजे पुण्याला पिंपळवंडी बुद्रुक म्हणण्यापैकी आहे. हे म्हणजे महावस्त्राला गमछा म्हणण्यापैकी आहे. हे म्हणजे आमरसाला गुळवणी म्हणण्यापैकी आहे. हे म्हणजे... (जाऊ द्या. उपम्यातच लेख संपायचा!) तर सांगायचा मुद्दा हा, की प्रमाण मराठी हे एक वेगळेच प्रकर्ण असून, ऋषीच्या कुळाप्रमाणे व नदीच्या मुळाप्रमाणे त्याचे कूळ व मूळ सापडणे कठीण होय. तरीदेखील 'तैत्तरीय उपनिषदा'प्रमाणे एक 'पत्तनीय उपनिषद' मुठेच्या तीरी उत्खननाअंती सापडल्याची चर्चा इतिहास संशोधक मंडळात दुपारच्या चहाच्या वेळी सुरू असल्याचे अस्मादिकांच्या कानी आले आहे. इतिहास संशोधक मंडळात दुपारी चहा मिळतो, या (तुलनेनं दुय्यम अशा) गोष्टीकडंच सर्वांचं लक्ष गेल्यानं ही अफवा असावी, अशी खातरी वाटून मंडळींनी संबंधित संशोधनाकडं दुर्लक्ष केलं. वास्तविक 'पत्तनीय' या नावातच हे उपनिषद पुण्यपत्तनाचे असावे, हे स्पष्ट होते. त्यातील 'पत्तनीय' या शब्दाविषयी इतिहास संशोधक मंडळातल्या विवाहित आणि अविवाहित मेंबरांमध्ये गंभीर मतभेद निर्माण झाल्याचे कळले. 'पत्तनीय' हा शब्द 'पत्नीय' या शब्दाचा अपभ्रंश असावा, यावर विवाहित मंडळी ठाम होती; तर विवाह झाल्यानंतर विवाहित मंडळी स्वतःच 'पत्तनीय' होत असल्यानं ती उपनिषदच काय, पण चार ओळींचा श्लोकदेखील लिहिण्याच्या योग्यतेची उरत नाहीत, असा अविवाहित मंडळींचा दावा होता, म्हणे. या दाव्या-प्रतिदाव्यांमध्ये दुपारच्या चहापासून ते संध्याकाळच्या वड्यापर्यंत वेळ गेला. अखेर या विषयाचा निर्णय घेण्यासाठी एक द्विसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय झाला आणि मंडळाची सभा संपली, असे समजले. पूर्वी वाचनालयात चोरून प्रौढांची मासिके वाचण्याचा छंद आम्ही जोपासला असल्यानं मंडळात सायंसमयी गुपचूप प्रवेश करणे आम्हास कठीण गेले नाही. आम्ही 'पत्तनीय उपनिषद' अलगद उलगडून चाळण्यास सुरुवात केली. चारशे भूर्जपत्राच्या त्या ग्रंथावर सुरुवातीलाच एवढ्या सूचना आणि उपसूचना होत्या, की हा ग्रंथ पुण्यनगरीतील प्रमाण मराठीतला आद्य ग्रंथ असावा, याविषयी आमच्या मनात तिळमात्र शंका उरली नाही. 'आपण ज्या पानांवर हा ग्रंथ वाचता आहात, ते भूर्जपत्र आहे, केळीचे पान नव्हे; सबब अन्नग्रहण करताना ग्रंथ पाहून त्याची वाट लावू नये,' ही पहिलीच सूचना वाचून तर ग्रंथाची जन्मदात्री पेठ कोणती असावी, हेही आम्हास कळून चुकले. मंडळाच्या परिसरातच या प्रमाणग्रंथाचा जन्म झाला असावा, हे ताडून आम्ही तातडीनं एक नीलफलक बनवायची ऑर्डर देऊन टाकण्याचा निर्धार मनातल्या मनात करून टाकला. अर्थात एवढ्या सूचना ज्या अर्थी आहेत, त्या अर्थी हे 'पत्नीय उपनिषद'ही असूच शकते, या विचारानं पुन्हा मनात शंकासुराने थैमान घातले. जसजसा ग्रंथ वाचीत गेलो, तसतसे हे 'पत्नीय' आणि 'पत्तनीय' असे दोन्ही उपनिषदांचे प्याकेज असल्याचे आमच्या ध्यानात आले. हे एवढे जीवघेणे मिश्रण सहन न झाल्यानेच तत्कालीन वाचकांनी हा ग्रंथराज प्रकाशित होण्यापूर्वीच मुठेच्या तीरी पुरला असावा, यात आता कोणतीही शंका राहिली नाही. घरोघरी (आपापल्या) धर्मपत्नींच्या मुखात असते, तीच 'प्रमाण मराठी' असा उलगडा आम्हाला अखेर झाला आणि ब्रह्मज्ञान झाल्याप्रमाणे आमच्यामागे झगमगीत वर्तुळ चमकू लागले. जिचं प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द अन् प्रत्येक अक्षर आपल्याला प्रमाण मानावंच लागतं, तिची भाषा ती प्रमाण भाषा! एवढी साधी-सोपी व्याख्या आमच्या जाणत्या पूर्वजांनी कित्येकशे वर्षांपूर्वी करून ठेवली होती, अं? आम्ही आदरानं हातच जोडले. तत्कालीन पुणेरी मराठीत तत्कालीन पत्नी आंब्याचा टोप आदळत आपल्या पत्तनीय पतीस म्हणाली असेल, 'ग्रंथ कसले खरडता? आम्रफलाची रसनिष्पत्ती कोण करणार? आमचे श्वशुरश्री? नुसता रस हवा प्राशायला...' त्यानंतर संबंधित पत्तनीय पतिराजांचा साहित्यातलाच नव्हे, तर एकूणच जगण्यातला रस कमी झाला असेल, यात काय नवल! आंब्याच्या दिवसात केळी खायची वेळ यावी, तसे आयुष्य झाले असणार. त्यातूनच या ग्रंथराजाला मुठेकाठी मोक्ष मिळाला असणार... नक्कीच!
पत्तनीय उपनिषदांतील काही कलमे खरोखर भयावह होती. तत्कालीन पत्नीसत्ताक पद्धतीचा प्रत्यय त्यातून येत होता. पतीने स्वयंपाक करावा, भांडी घासावीत, (गृहस्थ)आश्रमाची झाडलोट करावी, केरवारे करावे, एवढेच नव्हे, तर सायंकाळी तिला मोगऱ्याचा गजरा आणून देऊन तिची वेणी घालावी आदी नियम वाचून आम्ही जागीच पत्तनस्थ व्हायची वेळ आली. एका अर्थाने ही केवळ श्रवण करायची भाषा होती. बोलणारी केवळ पुण्यपत्तनस्थ पेठीय पत्नीच होती. मेरा वचन ही है मेरा शासन! बरोब्बर!! या भाषेचे हे उगमस्थान समजल्यानंतर अनेक कोड्यांचा एकदम उलगडा झाला... पत्तनीय उपनिषदाने फार मोठे काम केले होते.
आता मुद्दा बोलीचा होता. बोली भाषा ही मुळात बोलीच असल्यानं त्यात कुणी ग्रंथ लिहिला असण्याची शक्यता फारच धूसर होती. त्यातही मरहट्ट देशी बोलींचे अनेक प्रकार. खान्देशी बोली, वऱ्हाडी बोली, दखनी, कोकणी, आगरी, मराठवाडी अशा किती तरी... मग वाटलं, या प्रत्येक बोलीत तेव्हा कसं बोलत असतील? आणि काय आश्चर्य...! 'पत्तनीय उपनिषदा'च्या शेवटच्या पानावर आम्हाला एक खूण सापडली. तोंडावर पट्टी बांधलेला एक स्मायली असतो ना, तशी ती खूण दिसत होती. आम्ही हल्लीच काही रहस्यकथा वाचलेल्या असल्यानं हा 'क्लू' पकडून आम्ही एवढ्या रात्री त्वरेनं मुठेकाठी धाव घेतली. (रहस्यकथा वाचल्यानंतर काही काळ रात्री एकट्यानं गाव बोकाळणं अपरिहार्य असतं...) तिथं गेल्यावर आधी कॉफीपान करणे मस्ट असते. ते केले आणि मग सावकाशीनं 'क्लू'ची जागा शोधू लागलो. फार वेळ लागला नाही. 'पत्तनीय उपनिषद' सापडले होते, त्याच्याशेजारीच आम्हाला हा दुसरा ग्रंथ मिळाला - 'उत्तरीय उपनिषद'! उत्तरीय उपनिषदात तरी बोलीची उत्तरं मिळतील, अशी आशा होती. हा ग्रंथ अगदीच चिमखडा होता. अवघ्या ६०-७० पानांचा... आम्ही तो सहजीच बगलेत मारून मंडळात नेला. तेथील कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात (इतिहास संशोधन हे असेच करावे लागते. त्यामुळं आम्ही तेथील लाइटी घालवून कंदील पेटविला...) आम्ही 'उत्तरीय' तपासणी करू लागलो. इथं सूचना वगैरे काही नव्हत्या. थेट मजकूर होता. लेखकाच्या नावाच्या जागी 'पत्तनीय' एवढेच लिहिले होते. पुढं तत्कालीन च्यायला, मायला आदी शब्दांनी सुरुवात होती. नंतर 'भ'ची बाराखडी सुरू झाली. पुढं पुढं एवंगुणविशिष्ट मातृकुलाचा उद्धार करण्यात आला होता. तत्कालीन मराठी भाषा चांगलीच जोरकस होती, असे आमच्या लक्षात आले. तेव्हाच्या लोकांनी केवळ शिव्या देऊन एखाद्या सैन्याचा पाडाव केला, असे एखाद्या शुभ्रदाढीधारी संशोधकाने आत्ता आम्हाला सांगितले असते, तरी आम्ही त्यावर सहजी विश्वास ठेवला असता.

नंतर नंतर तर त्या ग्रंथात केवळ हो - हो, बरं, ठीक आहे, चालेल, अच्छा... जसं तू म्हणशील तसं, तुझी मर्जी एवढ्याच अर्थाचे तत्कालीन शब्द (ते शब्द इथं लिहिणं कठीण आहे...) दिसू लागले. आम्हाला कळेचना, हे असं का आहे ते? शेजारीच पडलेल्या 'पत्तनीय उपनिषदा'ची भूर्जपत्रं तेवढ्यात फडफडली. त्या आवाजानं दोन कबुतरं उडाली आणि दोन दिशांना पांगली. आम्ही एकदा 'पत्तनीय'कडं, तर एकदा 'उत्तरीय'कडं बघू लागलो. एव्हाना 'उत्तरीय'चं उत्तरीय घसरून आम्हाला आतल्या नग्न सत्याचं दर्शन घडलंच होतं. पण आता 'पत्तनीय'ची पानंही काही सांगू पाहत होती. आम्ही एकदा डावीकडं, तर एकदा उजवीकडं पाहू लागलो. आणि अचानक साक्षात्कार झाला. डोक्यात पूर्णच प्रकाश पडला. कंदिलाची वात मोठी झाली आणि आमचा चेहरा उजळला. 'पत्तनीय'मध्ये लिहिलेल्या आदेशवजा सूचनांचे पालन केल्याची माहिती तेवढी फक्त 'उत्तरीय'मध्ये दिली होती. याचा अर्थ हा ग्रंथ तत्कालीन 'पतीं'नी लिहिला होता... डावीकडे प्रश्न, उजवीकडं उत्तरं... खाली मान घालून दिलेली! सुरुवातीला कोड लँग्वेजमध्ये लिहिलेली अक्षरं म्हणजे शिव्या होत्या. त्या पत्नी विभागाला कळू नयेत, म्हणून खास वेगळ्या भाषेत लिहिल्या होत्या. पत्नीच्या आज्ञेसमोर आपलं काही चालत नसल्याची हताशा त्यातून जाणवत होती. भाषा आणि संताप जोरकस असला, तरी त्यातून करुणेचा एक झरा झुळूझुळू वाहत होता. आम्हाला 'उत्तरीया'ची दया आली. जी बोलू दिली जात नाही ती बोली! अच्छा, अशी भानगड आहे तर! तत्क्षणी तत्कालीन बोलीचा अभ्यास करण्याची आमची इच्छाच मरून गेली.
गेल्या कित्येक शतकांपासून सुरू आहे हे भांडण... फक्त तिचं ऐकायचं... आपण काही बोलायचं नाही. तिनं आदेश द्यायचा आणि आपण ऐकायचं. हेच सुरू आहे! ती आपली पत्नी आहे हे मान्य; पण एवढा धाक असतो का कुठं? पत्तनीय पतीला बोलूच द्यायचं नाही? हा हन्त हन्त... केवढी ही खन्त!
प्रमाण आणि बोलीचं लग्न लावून ज्या सोयऱ्यांनी दोघांच्याही आयुष्याची वाट लावली, त्यांचा शोध आम्ही घेत आहोत. आधी दोघंही किती सुखात होते. ती तिच्या प्रमाणात, मापात बोलत होती आणि तोही मुक्तछंदात तिच्यावर शब्दफुलं उधळत होता. ती नाजूक, प्रमाणबद्ध होती, तर तो मजबूत अन् रांगडा होता. ती त्याच्यावर अनुरक्त होती, तर तोही तिच्यावर लट्टू होता. ती महालातली राणी होती, तर तो माळरानाचा राजा होता. ती हळवी होती, तो कठोर होता. दोघांचीही जोडी छान होती. एकमेकांना शोभत होते. ते एकमेकांना पूरक आहेत हे ओळखून आमच्या पूर्वसूरींनी त्यांना वेळप्रसंगी 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहू दिलं; पण लग्न टाळलं. आता मात्र गोंधळ झाला. दोघांचंही लग्न लावण्याचा दुर्बोध हट्ट काही मंडळींनी धरला आणि पाट लावला. पाट लावला अन् तिथंच वाटही लागलीच! फार पूर्वीच्या काळी पुनवडी गावाच्या काठी असंच घडलं होतं आणि त्यातून 'पत्तनीय' आणि 'उत्तरीय'चा जन्म झाला होता.
आताही पुण्यनगरीच्या काठी, फेबु अन् व्हॉट्सअपच्या बांधावर हाच वेडा खेळ पुनश्च काही दुर्बोध मंडळी करीत आहेत, असं समजलं. अरेरे... काय हा वेडेपणा! या राक्षसविवाहातून ना तिला सुख, ना त्याला मज्जा! त्यातून जन्माला येणार फक्त विषम संकर, नकोशी संतती!
'नको, नको... नगं नगं, नकोय हे,  न्हाय पायजेल... सोडा मला... वंगाळ हाय हे...' आम्ही प्रमाण अन् बोलीत मिक्स किंचाळू लागलो. एकदम जाग आली. आम्ही घरातच होतो.
निद्रोपनिषद संपले होते... प्रमाण आयुष्य सुरू जाहले होते... पर ते बी 'बोली'वाणी लई झ्याक व्हतं...!

---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, जून २०१७)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----

फिरकीचा ठोंब्या - भाग ११

लेख : एक बनविणे
-----------------------

गेल्या महिन्यात बालसाहित्याच्या प्रांतात लुडबूड केल्यानं आम्ही स्वतःस अंमळ निरागस समजू लागलो होतो. नव्हे, आम्ही स्वतःचे मतच तसे बनवून घेतले होते. पण आमच्यातला हा कथित निरागसपणा अवघा महिनाभर टिकला. त्याला कारणही तसंच घडलं. मराठी साहित्यविश्वात काही तरी नव्यानं ‘बनत’ होतं... काही तरी बिघडत होतं... सगळं सविस्तरच सांगायला हवं...
साधारणतः साहित्य संमेलन संपलं, की आमच्या चिमुकल्या मराठी साहित्यविश्वाला गाढ झोप येते. अगदी मे महिन्यातल्या करकरीत दुपारी हापूसचा रस ओरपल्यावर येते तश्शीच! मग आम्ही लेखकमंडळी पुढील संमेलन येईपर्यंत बेडकासारखे शीतनिद्रेत जातो. रसपानानंतर एसी फुल्ल सोडून जी काही निद्रा येते ना, तिची तुलना फक्त एकाच गोष्टीशी करता येईल. ती गोष्ट अथवा क्रिया येथे सांगणे बरे नव्हे. परंतु जाणकार सुज्ञांस त्याचा अवश्य उलगडा होईल. तर मुद्दा साहित्यविश्वाच्या गाढ निद्रेचा होता. दुपारच्या वेळी गाढ झोपल्यानंतर अचानक कोणी येऊन आपल्याला गदागदा हलवू लागले, तर संबंधित व्यक्तीच्या मातृकुलाची आठवण त्वरेने येणे अगदी साहजिकच असते. तशाच पद्धतीनं गेल्या महिन्यात मराठीतल्या एका विदुषीनं आपल्या भाषेविषयीची खंत प्रकट करून गाढ झोपलेल्या साहित्यविश्वाच्या अंगावर शुद्ध भाषेच्या पाण्याचे चार सपकारे मारण्याचा प्रयत्न केला. मराठी भाषा नव्यानं 'बनविण्याचा' प्रयत्न सांप्रतकाळी जोमानं सुरू असल्याचं त्यावरून आमच्या ध्यानीमनी आलं. साहित्यविश्व गाढ निद्रेत असताना बाईंनी त्याच्या पार्श्वभागी हे चार रट्टे मारल्यानं त्या आता 'चावू आनंदे' किंवा 'द्यावे फटके' नावाचे नवे पुस्तक लिहिण्याच्या, नव्हे, बनविण्याच्या बेतात असाव्यात अशी दाट शंका आम्हास आली. वास्तविक मराठी साहित्याच्या त्या हेडबाईच असल्यामुळं आम्हाला त्यांच्याविषयी परमआदर आहे. किंबहुना त्यांनीच आम्हाला नेटके कसे लिहावे आणि आनंदाने कसे वाचावे हे शिकविले. मधल्या काळात आम्ही नसलो, तरी आमची भाषा मात्र नव्याने 'बनत' चालली आहे, याची आम्हाला खबरबात नव्हती. मात्र, बाईंनी नेमक्या दुखण्यावर बोट ठेवले. त्यामुळे चिमुकल्या मराठी साहित्यविश्वात एकच खळबळ 'बनून' राहिली. बनविण्यावरून खूप काही बनले-बिनसले. पत्रकारांनी अग्रलेख लिहिले, फेसबुक्यांनी पोस्टी टाकल्या, भाषाप्रेमींनी संताप व्यक्त केला आणि बाकीच्यांनी नुसतेच सुतकी चेहरे 'बनविले'. आम्ही इतरांपेक्षा वेगळे असल्याने चार लोक करतील तेच करण्यात अर्थ नव्हता. पण आपण होतकरू का होईना लेखकू आहोत, याची विनम्र जाणीव आमच्या मनात ‘बनून’ राहिली होती. तेव्हा 'बनेल'पणा करून काही तरी बनवायला हवे होते; अन्यथा बात 'बनली' नसती! बाकी काही का असेना, बिघडविण्यापेक्षा बनविण्याला महत्त्व आहे. त्यामुळे या विषयावर एक लेखच 'बनवून' टाकावा, असे आमच्या मनाने घेतले.
एकदा आम्ही मनावर घेतले, की मग आमचे सगळे छान 'बनून' येते. वास्तविक लेख लिहिणे हे आमच्यासारख्या लेखकूला अगदी सहज जमते. पण लेख लिहिणे वेगळे आणि लेख ‘बनविणे’ वेगळे. हा जरा नवा प्रयोग होता. म्हणून सुरुवातीला कुतूहल म्हणून आम्ही 'बनविणे' या क्रियापदाचाच अभ्यास सुरू केला. 'बन' हे त्याचे मूळ रूप असावे, अशी आम्हास शंका आली. आता हे शेवंतीचे 'बन' आहे की 'बन'मस्क्यातले 'बन', हे काही लक्षात येईना. पण एकाच वेळी हा शब्द मराठी आणि इंग्रजीतले नाम असू शकतो, एवढे उमगले. 'माझ्या मना बन दगड' असं विंदांनी सांगून ठेवल्याचं तेवढ्यात ध्यानीबनी, आपलं, ध्यानीमनी आलं. मग 'बन' हे आज्ञार्थी क्रियापदही होऊ शकते, असा विचार आम्ही मनाच्या बनात ठेवून दिला. काही काळापूर्वी मराठी साहित्यात 'बनी' नावाच्या आगाऊ मुलीने धुमाकूळ घातला होता. या बनीचा या क्रियापदाशी काही संबंध आहे का, हे आम्ही चाचपू लागलो. ही बनी एक नंबरची बावळट मुलगी असावी; कारण प्रत्येक लेखात संबंधित लेखक तिला 'बने, बने, अगं असं काय करतेस? इकडं बघ, तिकडं लक्ष दे, वेडी आहेस का, कसं समजत नाही तुला,' अशाच प्रकारे संबोधताना आम्ही वाचले आहे. तेव्हा काही साहित्यिकांनी या गरीब मुलीला ठरवून 'बनविले' असावे, अशी रास्त शंका आमच्या मनीबनी वस्तीला येऊन राहिली आहे. अर्थात बनीचा बनविण्याशी संबंध असला, तरी त्यात तिलाच 'बनविण्यात' आले असेल, तर सोडून दिले पाहिजे, असे म्हणून आम्ही बनीचा नाद सोडला.
खुद्द 'बनविणे' या क्रियापदाने आम्हाला किती बनविले आहे, याचा हळूहळू अंदाज येऊ लागला. हिंदीत लग्न करण्याला 'शादी बनाना' असे का म्हणतात, हे मराठीत लग्न 'बनविल्यास' तातडीने कळून येते. किंबहुना एकमेकांना 'बनविण्या'चीच ती स्पर्धा असते, असंही म्हणायला हरकत नाही. हिंदीतलं हे 'बनाना' क्रियापद इंग्रजीत एक निसरडं फळ देऊन जातं. त्याचा मराठी अर्थ सांगायलाच हवा का? तेव्हा कुणी आपल्याला बनविले आहे, याचा अर्थच त्याने आपल्याला हे फळ दिले आहे, असे समजून चालायचे. तेव्हा 'बनविणे' या क्रियापदाचा वापर मराठीत नाही नाही त्या ठिकाणी होऊ लागला, याचा अर्थ ही फसवणूकही व्यापक होत चालली आहे, असे समजायचे का? 'मी स्वयंपाक करते,' असे म्हणण्याऐवजी आमचे खटले 'मी स्वयंपाक बनविते' असे म्हणत असेल, तर ते वास्तवाच्या अधिक जवळ जाणारेच ठरत नाही काय! स्वयंपाक या नावाखाली ती त्या सर्व पदार्थांना आणि नंतर आम्हाला 'बनवत'च नसते काय! टीव्हीवर कार्यक्रम 'सादर करतो' याऐवजी 'कार्यक्रम बनवतो' असे कुणी म्हणत असेल, तर तोही अधिक प्रामाणिकच म्हणायला हवा. याचे कारण तो केवळ कार्यक्रमच नव्हे, तर प्रेक्षकांनाही 'बनवत' असतोच की... सिनेमा ‘बनवतो’, म्हणणारा तरी काय वेगळं करतो? तोही 'बनवतो'च...! आणि असे करताना अनावधानाने का होईना, पण प्रामाणिक वाक्यरचना केल्याबद्दल आपण त्यांचे 'धन्यवाद करायला' नकोत का? खरं तर धन्यवादसुद्धा 'बनवायला' काही हरकत नसावी. या कामी कुणी 'आमची' मदत करू शकेल काय? करणार असाल तर नक्की बघा. आम्ही त्यांचेही धन्यवाद 'करू'...
'बनविणे' या एका क्रियापदावर एक छानसा बनेल लेख कम् कथा होऊ शकते, हे एव्हाना आमच्या बनचुक्या मनाने नीटच हेरले होते. या कथेसाठी काय काय मुद्दे बनवता येतील, याचा आम्ही अंदाज घेऊ लागलो. शाब्दिक कोट्या बनविणे हा आमचा हातचा मळ होता. तेव्हा 'बनविणे' या शब्दावर जास्तीत जास्त कोट्या करण्याचे काम निश्चितच 'बनणार' होते. 'बनवारीलाल'पासून ते 'बनहट्टी'पर्यंत आणि 'बन का पंछी'पासून ते 'बनावट'पर्यंत एकही 'बन'शब्द आम्ही सोडला नाही. प्रत्येक वाक्यात आम्ही या 'बन'च्या लाद्या पसरल्या. त्या वाक्यांचा एकमेकांशी खरं तर काहीच संबंध नव्हता. पण आम्हाला काहीही करून लेख 'बनवायचा’च असल्यानं आम्ही शब्दांच्या या दाट 'बना'त शिरलो. त्यातून पुढीलप्रमाणे काही वाक्ये तयार झाली : 'बनगरवाडीत राहणाऱ्या बनकरांच्या बनवारीलालने बनसोडेंच्या बनीला काहीही करून आज बनमस्का खाऊ घालण्याची अत्यंत बनचुकी आणि बनावट योजना बनविली होती. त्याच्या कल्पनेप्रमाणे सर्व योजना बनवून झाली. बनशंकरीच्या मंदिरामागच्या बनात भेटून तिला बनमस्का द्यायचा होता. पण बनीच्या बापानं त्या दिवशी तिला कामावर जाऊच दिलं नाही. मग बनवारीनं मोठ्या मिनतवारीनं बनीला काही-बाही सांगून घराबाहेर काढलं. बनशंकरीच्या बनात गेल्यावर बनमस्काच काय, पण साधा पावही न मिळाल्यानं आपण बनवलो गेल्याचं बनीच्या लक्षात आलं...'
पुढं वाचवेना. डोकं अगदी ‘बनबनून’ - आपलं - भणभणून गेलं! हे असे लेख बनविणे म्हणजे बनमस्का खाण्याइतकी सोपी गोष्ट नव्हे, हे आमच्या लक्षात आले. तेव्हा या बनावट लेखाला आम्ही सत्वर काडी लावली. मन मात्र उदासच बनून राह्यलं मग...! शून्यातच गेलो...
...या एका ‘बनविणे’नं आमच्या साहित्यविश्वात केवढी खळबळ उडविली आहे, याची आता कुठं अंधुकशी कल्पना येऊ लागली. मग आम्ही आमच्या आजूबाजूला मराठी बोलणाऱ्या विविध माध्यमांकडं सहज पाहिलं. टीव्हीवरचे कार्यक्रम, वर्तमानपत्रं, मासिकं, नियतकालिकं, फेसबुक, व्हॉट्सअप सगळी-सगळीकडं अशी अनेक ‘बनावटगिरी’ भरून राहिली होती. शब्दांनी ताळतंत्र सोडला होता. महानगरांत सिग्नल बंद पडल्यावर चौकात जशी अवस्था होते, तशी बिचाऱ्या शब्दांची झाली होती. लिहिणाऱ्या किंवा तसा दावा करणाऱ्या बहुतेक सगळ्यांनी नियमांचं बोट सोडलं होतं. त्यामुळं शब्द बिचारे लज्जित होऊन, खालमानेनं रस्त्यावर उभे होते. त्यांना वापरून घेणारे बेदरकारपणे त्यांच्या अंगावरची वसनं फेडत होते. त्यांचे दागिने ओरबाडत होते. उच्चारांचे, लेखनाचे सगळे नियम कोपऱ्यात लोळागोळा होऊन पडले होते... शब्द मार खात होते, धक्के सोसत होते, शब्द बिचारे मुके मुके सगळं सोसत होते... शब्दांच्या अब्रूची किंमत नसणारे त्यांना ‘बनवून’ वापरत होते. अशा वेळी आपण मूकपणानेच शब्दांचे सांत्वन करायचे असते... कारण शब्दांचे सांत्वन करायला अजून कुठलेच शब्द नाहीत... 


मग शब्दांना भरून आले... ते उसासू लागले... मूकपणानेच काही सांगू लागले! त्यांना काय म्हणायचंय ते नीटच ऐकू येऊ लागलं. मग आम्हाला हवेतून अचानक तुकोबांची गाथा ऐकू येऊ लागली... त्या गाथेतले साधे-सोपे शब्द कानी पडताच मन आनंदले. शब्दांनाही आपले सगेसोबती भेटल्याचा आनंद झाला. तिथं मग आमच्या मायबोलीच्या शब्दांचं संमेलनच भरलं. अवघा रंग एक झाला! ज्ञानियांचा राजा आला, नाथांचं भारूड आलं, जनीचे अभंग आले, रामदासांचा दासबोध आला, बहिणाबाईंची कविता आली... अत्र्यांची चौफेर टोलेबाजी आली, शान्ताबाईंचे सालस-सहज शब्द आले, इंदिरा संतांचे शब्द बेळगावचा ‘मृद्-गंध’ घेऊन आले... दि. बा. मोकाशी आणि प्रकाश नारायण संतांचे साधी-सोपे शब्द आले, पुलं नावाचं शब्दांचं गारूड आलं, राम गणेश गडकरी नावाचा लखलखता रत्नहार दिसला, श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून ते चिं. विं. जोशींपर्यंत गडगडाटी हास्य करीत शब्द आले... ढसाळ-दया पवार वेदनेचा शब्द घेऊन आले... किती नावं घ्यावीत... पुढं पुढं तर सगळे शब्द एकमेकांत मिसळून गेले... पंढरपुरात आषाढीच्या यात्रेत चंद्रभागेच्या वाळवंटात अबीर-बुक्का उधळावा तसे सगळे शब्द आमच्या भोवतीच्या आसमंतात उधळले गेले... ‘मराठी मराठी’चा गगनभेदी गजर कानी पडला... आमच्या वऱ्हाडी, माणदेशी, कोकणी, मराठवाडी, खानदेशी, अहिराणी, मावळी, कोल्हापुरी अशा सगळ्या बोली पालखीला आल्या... शब्द तर नाचूननाचून बेभान झाले.... एवढे सुंदर दिसत होते नाचताना... प्रत्येकाचा वेष वेगळा, प्रत्येकाचा तोरा वेगळा, प्रत्येकाचा नाद वेगळा, प्रत्येकाचा साज वेगळा... तरीही सगळे आमच्या ‘माय’च्या मायेच्या बंधनानं बांधलेले... धन्य धन्य झालो... अन् अचानक उद्गार बाहेर पडला - काय सुंदर ‘शोभायात्रा’ ‘बनवलीये’ रे तुम्ही सगळ्यांनी!
...अन् रप्पकन पाठीवर रट्टा बसला. आम्ही खाडकन डोळे उघडले. समोर विदुषी हेडबाई हातात छडी घेऊन उभ्या होत्या... त्यांच्या भेदक नजरेमुळं आमचे सगळे बनचुके शब्द एकदम आटले... लेख ‘बनवायचा’ होता, तो राहूनच गेला!

----

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, मे २०१७)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

---