11 Jun 2024

पु. ल. स्मृती लेख

पु. ल. गेले तो दिवस...
--------------------------


१२ जून २०००. माझ्या आयुष्यात मी हा दिवस कधीही विसरू शकणार नाही. ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व’ पु. ल. देशपांडे या दिवशी हे ऐहिक जग सोडून गेले. माझ्या पिढीतील इतर अनेकांप्रमाणे माझाही पिंड पु. लं.च्या साहित्यावर पोसला गेला आहे. पु. लं.चं व्यक्तिमत्त्वच एवढं मोठं होतं, की त्यांनी विसाव्या शतकातील मराठी साहित्यविश्वावर अमीट असा ठसा उमटवला आहे. एखाद्या साहित्यिकावर एवढं मन:पूत प्रेम करणारा महाराष्ट्र तेव्हा अनुभवता आला, हे माझं भाग्य. 
मी आज सांगणार आहे, ती पु. ल. गेले त्या दिवसाची आठवण. त्याआधी थोडी पार्श्वभूमीही सांगायला हवी. मी तेव्हा ‘सकाळ’मध्ये उपसंपादक म्हणून काम करत होतो. मला तिथं काम करायला सुरुवात करून जेमतेम अडीच-तीन वर्षं होत होती. विजय कुवळेकर साहेब तेव्हा संपादक होते. पु. ल. त्या काळात अर्थात अतिशय थकले होते. ‘एक होता विदूषक’ हा त्यांनी पटकथा-संवाद लिहिलेला चित्रपट एक जानेवारी १९९२ रोजी प्रदर्शित झाला. हे त्यांचं बहुतेक अखेरचं मोठं काम. त्यानंतर पु. लं.नी पार्किन्सन्समुळं सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतल्यासारखीच होती. त्यांचं दर्शन दुर्मीळ झालं होतं. मात्र, तरीही ‘ते आहेत’ ही भावनाच पुरेशी होती. मला पु.लं.ना प्रत्यक्ष कधीच बघता आलं नाही. मी त्यांना सदेह बघितलं ते थेट ‘प्रयाग’मध्ये ते शेवटच्या आजारपणात दाखल झाले तेव्हाच! अर्थात त्यांना कधी भेटलो नसलो, तरी माझ्याकडं त्यांची एक सोडून चार चार पत्रं होती. हा फार मोठा अनमोल ठेवाच ठरला आहे आता माझ्यासाठी. शिवाय मी पॉलिटेक्निकमध्ये शिकत असताना सार्वजनिक फोनवरून एकदा त्यांच्याशी फोनवर बोललो होतो. (त्याबाबत मी यापूर्वी ब्लॉगवर लिहिलेलं असल्यानं ते अनुभव आता इथं तपशिलात लिहीत नाही.) मात्र, त्यांना प्रत्यक्ष बघण्याचा योग काही आला नाही. आला तो असा - रुग्णालयातील बेडवर विकल अवस्थेत झोपलेल्या आणि नाकातोंडात नळ्या अशा स्थितीत... तेव्हा मनाला केवढ्या यातना झाल्या असतील याचा आता विचारही करवत नाही.
पु. ल. सार्वजनिक जीवनात तेव्हा फारसे सक्रिय नसले, तरी तेव्हा सत्तेवर आलेल्या युती सरकारने पहिला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार पुलंना देण्याची घोषणा केली. त्या कार्यक्रमाला दाढी वाढलेले पु. ल. व सुनीताबाई दोघेही उपस्थित होते. पु. लं. ना भाषण करता येण्यासारखी परिस्थिती नव्हती, म्हणून सुनीताबाईंनी त्यांचं भाषण वाचून दाखवलं. त्यात सत्ताधाऱ्यांच्या ‘ठोकशाही’वर टीका असल्यानं नंतर एकच गदारोळ झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘झक मारली आणि पुलंना पुरस्कार दिला’ असे उद्गार काढले. ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रात ‘मोडका पूल’ अशा शीर्षकानं एक व्यंगचित्रही प्रसिद्ध झालं. मात्र, पु. ल. व सुनीताबाई यांनी त्यांच्या स्वभावानुसार, नंतर या विषयाबद्दल एक अक्षरही काढलं नाही. नंतर वातावरण निवळल्यावर शिवसेनाप्रमुख पुलंना भेटायला पुण्याला त्यांच्या घरी आले. पु. ल. हे बाळासाहेबांचे एके काळचे शिक्षक. त्यामुळे खुर्चीवर बसलेल्या पु. लं.च्या पायावर डोके ठेवून त्यांनी नमस्कार केला. हा क्षण आमचे तेव्हाचे फोटोग्राफर मिलिंद वाडेकर यांनी नेमका टिपला. शिवसेनाप्रमुख म्हणाले, की माझ्या गाडीत कायम पु. लं.च्या कॅसेट असतात आणि मी कायमच त्या ऐकत असतो वगैरे.
या काळात पु. ल. पुन्हा माध्यमांत चर्चेत आले असले, तरी नंतर मात्र त्यांचं आजारपण बळावलं. पु. लं.नी ८ नोव्हेंबर १९९९ रोजी वयाची ऐंशी वर्षं पूर्ण केली, तेव्हा पुण्यात ‘आशय’ने मोठा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला होता. माझ्या माहितीनुसार, त्यांच्या पुलोत्सवाची ती सुरुवात होती. अर्थात पु. ल. स्वत: यापैकी कुठल्याच कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. जूनच्या सुरुवातीला पु. लं.ची तब्येत बरीच खालावली आणि त्यांना डेक्कन जिमखान्यावरील प्रयाग यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. या वेळचं त्यांचं आजारपण गंभीर असल्याचं समजल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पु. लं.च्या चाहत्यांचा जीव खाली-वर होऊ लागला. पु. लं.ची प्रचंड लोकप्रियता पाहता, त्यांच्या तब्येतीबाबतची प्रत्येक बातमी अतिशय महत्त्वाची होती. तेव्हा वृत्तवाहिन्या नुकत्याच सुरू झाल्या होत्या. मराठीत तर पूर्ण वेळ वृत्तवाहिनी एकही नव्हती. तेव्हा वृत्तपत्रांची जबाबदारी सर्वाधिक होती. त्यातही पुण्यात ‘सकाळ’मध्ये त्यांच्या प्रकृतीची इत्थंभूत माहिती येणं अगदी आवश्यकच होतं. 
तेव्हा आम्ही काही जण ऑफिसमधली रात्रपाळी संपली, की ‘प्रयाग’ला एक चक्कर मारायला लागलो. प्रयाग हॉस्पिटलतर्फे रोज पु. लं.च्या तब्येतीची माहिती देणारं एक बुलेटिन जारी केलं जात असे. मात्र, ते दिवसा आणि संध्याकाळी असे. रात्री-बेरात्री काही झालं तर आपल्याला कसं कळणार, असं सगळ्याच पेपरमधल्या पत्रकारांना वाटायचं. तेव्हा बरेच पत्रकार काम संपलं, की मंडईत जमायचे. त्याऐवजी आता ते ‘प्रयाग’समोर जमू लागले. रात्री तीन किंवा क्वचितप्रसंगी साडेतीन-चारपर्यंत काहीही अघटित घडल्याचं समजलं, तरी प्रत्येक वृत्तपत्र ही बातमी लगेचच देण्यासाठी तत्पर होतं. त्यासाठीच सगळे तिथं एकत्र थांबायचे. पु. लं.च्या प्रकृतीतील चढ-उतार जवळपास आठवडा किंवा त्याहून अधिक काळ सुरू होते. एकदा यातली एक बातमी ‘सकाळ’मध्ये चुकली. त्या वेळी संपादक कुवळेकर साहेब स्वाभाविकच चिडले आणि त्यांनी ‘प्रयाग’बाहेर बातमीदारांची रीतसर २४ तास ड्युटीच सुरू केली. मी डेस्कवर काम करत असलो, तरी पु. लं.विषयीच्या आत्यंतिक जिव्हाळ्यामुळं मीही रोज रात्री तिथं जाऊन थांबत असे. मुकेश माचकर यांची आणि माझी ओळख तिथंच झाली. पु. लं.च्या कुटुंबीयांच्या वतीनं डॉ. जब्बार पटेल यांनी माध्यमांना सर्व माहिती देण्याची जबाबदारी घेतली होती. दहा की अकरा जून रोजी तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख पु. लं.ची प्रकृती पाहायला येणार असल्याचं कळलं, तेव्हाच आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. विलासरावांच्या आगे-मागे बाळासाहेब ठाकरेही येऊन गेले. इतर नेत्यांची रीघ लागली, तसं आमची शंका बळावत चालली. पु. ल. जायच्या आदल्या दिवशी रात्री दीड-दोनच्या सुमारास आम्ही ‘प्रयाग’च्या मागल्या बाजूला जमलो होतो. तिथून शेजारच्या खोलीतील पु. ल. स्पष्ट दिसत होते. माझं लक्ष वारंवार त्यांच्याकडं जात होतं आणि मी निग्रहानं दुसरीकडं मान वळवत होतो. डॉ. पटेल आणि आम्ही काही लोक तिथं बोलत असताना, पलीकडंच सुनीताबाई शांत चित्तानं डोळे मिटून एका खुर्चीवर बसल्या होत्या. तेवढ्यात एका सरकारी माध्यमात काम करणाऱ्या, जरा आगाऊ अशा वरिष्ठ पदावरच्या बाईंनी एकदम जब्बारना विचारलं, ‘अहो डॉक्टर, भाई पद्मभूषण होते की पद्मविभूषण? नाही म्हणजे उद्या लागेल ना आम्हाला ते सगळं...’
त्यांच्या या उद्गारानंतर आम्ही सगळे अवाक झालो. डॉक्टर त्या बाईंवर भडकलेच. सुनीताबाई अगदी जवळ होत्या. त्यांनी हे बोलणं ऐकलं असेल का, या विचारानं आमच्या सगळ्यांचाच थरकाप उडाला. आम्ही सगळे तिथून दूर निघून बाहेर रस्त्यावर आलो. आम्ही इतर पत्रकार त्या बाईंच्या या उद्गारावर चिडलो होतो. मात्र, एकीकडं आता सगळं संपत चाललं आहे, याची एक विषण्ण जाणीवही झालीच. मी तिथून घरी जायला निघालो. पु. लं.चं मला झालेलं ते शेवटचं दर्शन...
दुसऱ्या दिवशी १२ जून. सकाळपासूनच पु. लं.च्या प्रकृतीविषयी उलटसुलट ऐकायला मिळत होतं. ‘प्रयाग’ने आदल्या दिवशीच बुलेटिन काढून ‘व्हेरी क्रिटिकल’ असं सांगितलंच होतं. पु. लं.चे लाडके भाचे डॉ. दिनेश ठाकूर व कुटुंबीय अमेरिकेतून येणार होते. ते आल्यानंतरच कदाचित बातमी जाहीर होणार होती. पु. लं.ना शेवटच्या क्षणांत कुठलाही त्रास होऊ नये, यावर सुनीताबाईंचा कटाक्ष होता. अति उपचार किंवा त्यांच्या शरीरावर नसते प्रयोग करू नयेत, असं त्यांनी डॉक्टरांना सांगितलं होतं. अखेर दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी ती नकोनकोशी बातमी आलीच. ‘आपल्या लाडक्या पु. लं.नी शांतपणे हे जग सोडलं,’ असं डॉ. शिरीष प्रयाग यांनी हॉस्पिटलसमोर जमलेल्या गर्दीला सांगितलं. बातमी अपेक्षित असली, तरी मनात कल्लोळ उठला. डोळे पाण्यानं भरले. ज्या माणसानं आपल्याला एवढा आनंद दिला, एवढं हसवलं, जगणं शिकवलं तो आता शरीरानं आपल्यात नाही, ही भावनाच फार फार त्रासदायक होती. अर्थात, पत्रकारांना अशा वेळी भावनेला आवर घालून कामं करावी लागतात. मी लगेच ऑफिसला गेलो. पु. लं.संदर्भातल्या बातम्या, संदर्भ अशा गोष्टींना मदत करत राहिलो. कृत्रिमपणे सगळं काम करत राहिलो... संध्याकाळी ऑफिसमधून सुटल्यावर मात्र बांध आवरता आला नाही. तिथून माझ्या रूमवर जाईपर्यंत मनसोक्त रडून घेतलं. आपल्या जगण्याचा एक मोठा हिस्सा एकदम नाहीसा झाल्याची जाणीव झाली होती.
दुसऱ्या दिवशी उठल्यावर सगळे पेपर वाचले. ‘मटा’नं तर संपूर्ण अंकच पुलमय केला होता. मी तेव्हा ‘सकाळ’मध्ये असलो आणि ‘सकाळ’नेही उत्तम कव्हरेज केलं असलं, तरी मला ‘मटा’चा अंक अतिशय आवडला. विशेषत: ‘मटा’चा अग्रलेख अप्रतिम होता. ‘आपले आनंदगाणे संपले’ असं (की असंच काहीसं) त्याचं शीर्षक होतं. तो अग्रलेख वाचायला सुरुवात केल्यानंतर तीन-चार वाक्यांनंतरच माझ्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागलं. हा अग्रलेख कुमार केतकर यांनी लिहिला होता, हे नंतर कळलं. (याच्या दुसऱ्याच दिवशी केतकरांनी सुनीताबाईंना उद्देशून आणखी एक मोठा अग्रलेख लिहिला होता. तोही अतिशय वाचनीय होता.)
माझ्या आठवणीनुसार, पुलंवर दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ जून रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी त्यांचं पार्थिव सर्वसामान्य रसिकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. (ते कुठं ठेवलं होतं, हे मला आता आठवत नाही. बहुतेक ‘मालती-माधव’मध्ये असावं...) मी तिथं जाऊन त्यांचं अखेरचं दर्शन घेऊन आलो. ‘वैकुंठ’ला मात्र मी गेलो नाही. ते सगळं मी टीव्हीवर पाहिलं. 
पु. ल. गेले त्याला आज दोन तपं पूर्ण होतील. पु. ल. शरीरानं गेले असले, तरी ते आपल्यात आहेतच. त्यांनी एवढं लिहून ठेवलं आहे आणि ते बहुतेकांना आता एवढं पाठ आहे, की पुस्तक उघडायचीही गरज पडत नाही. पु. ल. इतर साहित्यिकांच्या मानानं आणखी सुदैवी, याचं कारण दृकश्राव्य माध्यमाचं महत्त्व त्यांना खूप आधी कळलं होतं. त्यामुळं पुलंचे व्हिडिओ, त्यांचं अभिवाचन, त्यांची नाटकं हे सगळं आज इंटरनेटवर उपलब्ध आहे. पुलंवर फेसबुकवर अनेक पेजेस आहेत. त्यात हजारो लोक रोज त्यांच्या आठवणी जागवत असतात. अगदी ‘इन्स्टाग्राम’वरही पु. ल. आहेत. त्यांच्या गाजलेल्या वाक्यावाक्यांचे रील्स आहेत. मुंबईत रवींद्र नाट्य मंदिरात पु. ल. देशपांडे अकादमी आहे आणि तिथं समोर त्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. पुण्यात सिंहगड रोडवर अतिशय सुंदर अशा जपानी उद्यानाला पु. ल. देशपांडे उद्यान असं नाव देण्यात आलं आहे. त्या उद्यानाबाहेर फूटपाथवर पु. लं.चे कोट्स, त्यांची पुस्तकं वगैरेंची शिल्पं लावली आहेत. तसंच फर्ग्युसन रोडवरही फूटपाथवर पु. लं.ची चित्रं लावली आहेत. रोज येता-जाता ती दिसतात. रोज रात्री घरी जाताना मी पु. ल. देशपांडे उद्यानावरून जातो. तेव्हा नकळत नजर डावीकडं त्यांच्या लफ्फेदार सहीवर जाते. मी छातीवर हात ठेवून मनोमन त्यांना नमन करतो आणि पुढं जातो. ‘ते आहेत’, ‘ते आपल्यासाठी इथंच आहेत’ ही भावना मनात दाटून येते. मन प्रसन्न होतं... दिवसाचा सगळा ताण निघून जातो... हेच तर ते करत आले आहेत आपल्यासाठी... हयात होते तेव्हाही आणि आता ऐहिक रूपात नाहीत तेव्हाही! 


----

8 comments:

  1. खूप सुंदर लेख आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वावर...वाचताना मन खूप भरून येत होत ...त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन !🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. अप्रतिम लेख

    ReplyDelete
  3. खूप सुंदर लिहिलंय. आपल्यापैकी असंख्यांच्या भावना आपण लेखात मांडल्या आहेत.

    ReplyDelete