13 Jul 2025

फुलपाखरू - प्रस्तावना व परीक्षण

फुलपाखरू प्रस्तावना व परीक्षण
------------------------------------------------------

माझं ‘फुलपाखरू’ हे कुमारकथांचं पुस्तक मे महिन्यात प्रकाशित झालं. या पुस्तकाला प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका विभावरी देशपांडे हिनं प्रस्तावना लिहिली आहे. ही प्रस्तावना आणि सोबत या पुस्तकाचं साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका-कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांनी ‘मटा’साठी केलेलं परीक्षण...

----

मुलांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन

विभावरी देशपांडे

‘करील मनोरंजन जो मुलांचे जडेल प्रभूशी नाते तयाचे’ ही सानेगुरुजींची उक्ती आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. आपण त्या दर्जेदार, मूल्याधिष्ठित साहित्यावर वाढलोही आहोत. पण आजही बालसाहित्याला, बालनाट्याला आणि बालचित्रपटांना मुख्य प्रवाहात महत्वाचं स्थान मिळत नाही. तरीही त्या निर्मितीतून मिळणारा  निखळ आनंद आणि बालप्रेक्षकांचं, बालवाचंकांचं भरभरून मिळालेलं प्रेम माझ्यासारख्या मुलांसाठी काम करणाऱ्यांना हवंहवंसं वाटतं.
लहान मुलांसाठी लिहिताना आपल्या आतलं मूल जागं करावं लागतं. लहान मुलाचा निरागसपणा, प्रचंड कुतूहल, निस्सीम प्रेम करण्याची क्षमता, कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय जगाकडे बघण्याची वृत्ती  ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा आपल्याच आत जाऊन  शोधाव्या लागतात. लहान मुलांच्या  नजरेतून जगाकडे बघावं लागतं. नाहीतर आपलं लिखाण अप्रामाणिक आणि उपरं वाटू लागतं. श्रीपादच्या कथांमध्ये मला जाणवलेली आणि भावलेली ही एक महत्वाची गोष्ट आहे. श्रीपादच्या स्वभावातच त्यानी त्याच्या आत जपून ठेवलेलं एक मूल आहे. माणूस म्हणून त्याच्यात  असलेला उत्साह, प्रेम करण्याची, माणसं जोडण्याची वृत्ती त्याच्या ह्या कुमारकथांमध्ये तंतोतंत उतरली आहे.
ह्या कथांची भाषा साधी आणि ओघवती आहे. मुलांचं जग काही आपल्या जगापेक्षा वेगळं नसतं. आपल्याच भवतालात ती जगत असतात. फक्त त्यांचा दृष्टीकोन, निरीक्षण आणि जाणिवा वेगळ्या असतात. श्रीपादनी नेमकं हेच अचूक पकडलं आहे. त्याच्या कथांमधली मुलं ह्याच जगातली आहेत. त्यांचा भवताल हाच आहे. पण त्यात ती काय पाहतात, काय अनुभवात आणि त्यातून त्यांचा भावनिक, मानसिक प्रवास काय होतो हे ह्या कथा आपल्यासमोर हळूच उलगडतात. मग पौगंडावस्थेतल्या मुलीला जाणवणारा एकटेपणा, त्यातून तिची एका कृत्रिम यंत्राशी झालेली तात्पुरती मैत्री आणि त्यातली भावनाशून्यता जाणवल्यावर परत माणसांच्या जगापर्यंत तिचा झालेला प्रवास ही कथा असो किंवा लहान गावातल्या, सामान्य परिस्थितील्या एका मुलाच्या आयुष्यात एक दिवस काहीतरी अद्भुत घडल्याची कथा असो, ह्या कथांनी कुमार वयातल्या मुलामुलींचं संवेदनशील मन खूप छान पकडलं आहे. त्यात विषयांचं, सामाजिक, भौगोलिक वास्तवाचं वैविध्य आहे. आणि मुख्य म्हणजे मुलांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन आहे.
कथा लांबलचक नाहीत. मोजक्या शब्दांत एक संपूर्ण अनुभव देणाऱ्या आहेत. त्यात केंद्रस्थानी कुमार वयातली मुलं आहेत. घटना, प्रसंग प्रौढांच्या जगातले असले तरी ती फक्त पार्श्वभूमीच राहते. कथा घडते ती मुलांच्या तात्कालिक भावविश्वातच. तरीही ह्या कथा मोठ्यांसाठीही रंजक होतात कारण मुलांचा दृष्टिकोन आपल्याला आपल्या बालपणात घेऊन जातो.
आजच्या काळात पुढची पिढी मराठी भाषेपासून दूर जात असताना मुलांसाठी मराठीत उत्तम साहित्य निर्माण होणं, त्याची भाषा सुयोग्य आणि सुंदर असणं ही अपरिहार्यता   आहे. श्रीपादसारख्या अचूक आणि उत्तम मराठी बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या लेखकांनी अशी साहित्यनिर्मिती करणं म्हणजे भाषा टिकवण्यासाठी उचललेले उत्तम पाऊल आहे असं मला वाटतं.
श्रीपादनी मुलांसाठी अधिकाधिक लिहीत राहावं. तो ते करीलच. माझ्याकडून ह्या पुस्तकाला मनःपूर्वक शुभेच्छा.

-----------

फुलपाखरू परीक्षण
-------------------------

मुलांच्या मनात शिरून लिहिलेल्या कथा

डॉ. संगीता बर्वे

मोठी माणसं जेव्हा जेव्हा आपलं बालपण आठवतात तेव्हा ते त्यात रमून जातात. मग ते म्हणू लागतात, किती छान होतं ना आपलं बालपण... अगदी फुलपाखरासारखं!
आता मात्र अगदी उलट झालंय. माणसं मोठी झाल्यावर त्यांचा सुरवंट होत जातो आणि ती आपापल्या कोशात जातात. त्यांना अनेक कंगोरे फुटतात. जगण्यातले अनेक काटे त्यांच्या आणि दुसऱ्यांच्या अंगाला टोचू लागतात. मग मोठी माणसं म्हणू लागतात की रम्य ते बालपण... ते बालपण आपल्याला परत मिळाले पाहिजे.
खऱ्या खऱ्या फुलपाखराचं मात्र माणसापेक्षा वेगळं असतं… ते आधी सुरवंट असतं आणि नंतर त्याचं रूपांतर रंगीत फुलपाखरात होतं. मोठ्या माणसांची काही वेळा गडबड होऊन जाते. आधीचं फुलपाखरासारखं जगणं नंतर सुरवंटासारखं काटेरी होऊन जातं.
श्रीपाद ब्रह्मे यांनी मात्र आपलं बालपण अजूनही तसंच छान जपलं आहे. मुलांसाठी त्यांनी छान छान गोष्टी लिहिल्या आहेत. आणि बुकगंगा पब्लिकेशन्सनं सुबकपणे पुस्तकरूपात त्या मुलांपर्यंत पोहोचवल्याही आहेत. मुलांसाठी कुमारकथा लिहिणारे लेखक हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकेच असावेत.  श्रीपाद ब्रह्मे यांनी 'फुलपाखरू' या कथासंग्रहामध्ये ‘सुरवंटाचे फुलपाखरू होतानाच्या कुमारकथा’ लिहून ही उणीव भरून काढली आहे.
‘लहान मुलांसाठी लिहिताना आपल्या आतलं मूल जागं करावं लागतं. लहान मुलांचा निरागसपणा, प्रचंड कुतूहल, निस्सीम प्रेम करण्याची क्षमता, कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय जगाकडे बघण्याची वृत्ती या सगळ्या गोष्टी पुन्हा आपल्याच आत जाऊन शोधाव्या लागतात; नाही तर आपलं लिखाण अप्रामाणिक आणि उपरं वाटू लागतं,’ असं अभिनेत्री आणि लेखिका विभावरी देशपांडे यांनी ‘फुलपाखरू’च्या प्रस्तावनेत लिहिलं आहे. ते किती यथार्थ आहे हे ब्रह्मे यांच्या कुमारकथा वाचताना जाणवतं.
ब्रह्मे यांनी अतिशय विचारपूर्वक मुलांच्या मनात शिरून लिहिलेल्या या कथा आहेत. रायगड येथे सहलीला गेलेली सायली फुलपाखराच्या मागे धावता धावता रस्ता चुकते आणि मैत्रिणी पुढे गेल्यानंतर मनातून जरा घाबरते. मात्र, हळूहळू स्वतःला सावरत मनाशी म्हणते, की  जास्तीत जास्त काय होईल? आपल्याला न घेता तर हे लोक नक्कीच जाणार नाहीत. त्यांना कळलंही असेल की मी हरवलेय म्हणून… फुलपाखराच्या नादापायी आपण रस्ता चुकलो म्हणून…  तिला फुलपाखराचा खूप राग येतो. मात्र, ते किती मस्त उडतंय, तसं छान आपल्याला जगता यायला हवं असं तिला वाटून जातं. ती हळूच फुलपाखराजवळ जाते. फुलपाखरू पुढं आणि सायली मागं असं करता करता पाण्याचा आवाज येऊ लागतो आणि ती रेंजमध्ये आल्यामुळे तिचा मोबाइल खणखणतो. सायलीला रस्ता सापडतो.
'अपना टाईम आयेगा 'ही तर फारच भन्नाट गोष्ट आहे. डिजिटल घड्याळ हवं असणाऱ्या रघूला चक्क विराट कोहलीकडूनच अशा घड्याळाची भेट मिळते. कशी ते तुम्हाला गोष्टीतूनच वाचावं लागेल. गोष्टी वाचता वाचताच आपण गोष्टींच्या जंगलात कधी शिरतो हे कळतच नाही.
‘एक होतं जंगल. जंगलात काहीच नव्हतं मंगल. झाडे दु:खी, प्राणी दुःखी, नदी दुःखी, नद्यांमधले मासेही दुःखी... का बर बाबा असं?’ असा प्रश्न मुलांना नक्की पडेल आणि उत्सुकतेने ते पुढे वाचतील तर जंगलामधले प्राणी का दुःखी आहेत, याचे कारण कळल्यानंतर त्यांच्या मनात सुरू होणाऱ्या विचारांचं अत्यंत प्रभावी चित्रण ‘सेल्फी, सेल्फी सेल्फिश’ या कथेमध्ये लेखकाने रेखाटले आहे.
समुद्रदेवतेच्या वेशात दिसलेली सुशी, राधाच्या रेंजमध्ये आलेले आई-बाबा, गाड्यांचे नंबर पाठ करणारा डोंगरवाडीचा रघू... रघूच्या तर सगळ्याच करामती कुमार वाचकांना नक्की आवडतील; कारण लेखकाने खरोखरच मुलांच्या मनाचा विचार करून, मुलांच्या मनात शिरून त्यांच्या मनात काय चालले असावे याचा अभ्यास करून या गोष्टी लिहिल्या आहेत. तेव्हा छोट्या मित्रांनो , श्रीपाद ब्रह्मे यांचा ‘फुलपाखरू' हा कथासंग्रह तुम्ही नक्की वाचा आणि तुमच्या मनात ज्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टीरूपात आणण्याचा प्रयत्न करा असे जाता जाता सहज म्हणून सांगावेसे वाटते.

 …

फुलपाखरू
लेखक : श्रीपाद ब्रह्मे
प्रकाशक : बुकगंगा पब्लिकेशन्स
पृष्ठे : ११४, किंमत : १५० रुपये


(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणी, १३ जुलै २०२५)

---

हे पुस्तक विकत घ्यायचे असल्यास इथे क्लिक करा...

----

11 Jul 2025

‘मेट्रो... इन दिनों’विषयी...

महानगरांतले ‘महासागर’
------------------------------


टायटॅनिक चित्रपटातला एक संवाद मला फार आवडतो. रोझ म्हणते - ए वुमन्स हार्ट इज ॲन ओशन ऑफ सिक्रेट्स... किती खरं आहे ते! मला वाटतं, केवळ स्त्रीच का, आपल्या सर्वांचीच हृदयं म्हणजे गुपितांचे महासागर असतात. अनुराग बासूच्या ‘मेट्रो... इन दिनों’मधली सगळी पात्रंही अशीच. हृदयात कसल्या कसल्या गुपितांचे - रागाचे, द्वेषाचे, तिरस्काराचे, व्यक्त न केलेल्या भावनांचे, अलोट प्रेमाचे, जिव्हाळ्याचे, आतल्या आत कुढण्याचे - महासागर बाळगणारी. हा सिनेमा बघण्याचं एक खास कारण होतं. याच दिग्दर्शकानं २००७ मध्ये आणलेल्या ‘ए लाइफ इन ए मेट्रो’ या चित्रपटानं तेव्हाच्या जाणिवांना चांगलाच हादरा दिला होता. आपला भवताल बदलतो आहे यात फार धक्कादायक नव्हतं; मात्र आपणही बदलतोय, आपल्या धारणाही बदलताहेत हे जाणवून जास्त हादरा बसला होता. आता १८ वर्षांनी त्या सिनेमाचा - कथानक म्हणून नव्हे; तर कथनाचा आत्मा म्हणून - जणू सीक्वेल असलेला हा सिनेमा कसा झाला असेल, हे पाहण्याची उत्सुकता होती. महानगरी जगण्यात आपण आपल्या भावभावनांचं व्यवस्थापन करताना (किंवा करता न आल्यानं म्हणा) जे काही घोळ घालून ठेवतो, त्या गोंधळाची - आतल्या अन् बाहेरच्या ‘केऑस’ची - ती कहाणी होती. आता १८ वर्षांनी तर काळ आणखीनच बदललाय. तेव्हा आकार घेत असलेली महानगरं आता अक्राळविक्राळ रूप धारण करून बिनचेहऱ्याची झाली आहेत. मॉलपासून मेट्रोपर्यंत सर्वत्र चकचकाट वाढला आहे, पण आपल्या आतला संवेदनांचा दिवा तेवतो आहे का? काहीच कळेनासं झालंय. आधीचा सिनेमा आला होता, तेव्हा सात वर्षांची असलेली पिढी आता पंचविशीत आहे. त्यांचं जगणं सुरुवातीपासूनच महानगरी आणि त्यामुळं सर्वच बाबतींत ‘केऑटिक’ आहे. मग त्यांचं आणि त्यांच्यासोबत जगत असलेल्या माझ्यासारख्या मधल्या पिढीचं आणि त्याहून मोठ्या म्हणजे सीनिअर्सचं जगणं आता कसं झालं आहे? मूलभूत भावना त्याच असल्या, तरी त्या हाताळण्यातला गोंधळ वाढला आहे की कमी झाला आहे? या आणि अशा सगळ्या प्रश्नांना भिडणारा ‘मेट्रो... इन दिनों’ या कारणांसाठी तरी बघायला हवा. एक प्रकारे आपणच आरशात बघितल्यासारखं हे आहे.
‘मेट्रो... इन दिनों’ चित्रपट चांगला मोठा आहे. तब्बल पावणेतीन तासांचा. दिग्दर्शकानं तब्येतीत यातली सगळी पात्रं उभी केली आहेत. अर्थात तब्बल आठ प्रमुख व्यक्तिरेखा असल्यानं त्यातही सर्वच्या सर्व पात्रं तितक्याच ताकदीनं ठसतात, असं नाही. काही जमली आहेत, तर काही फसली आहेत. उदा. पार्थ (आदित्य रॉय कपूर) या व्यक्तिरेखेचा संपूर्ण आलेख चांगला उभा राहिला आहे. वस्तुत: या व्यक्तिरेखेला सिनेमात नातेसंबंधांचा काहीच आगापिछा नाही. तरीही एक संपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणून ते पात्र आपल्यासमोर नीट उभं राहतं. याउलट अनुपम खेरनं साकारलेला ज्येष्ठ नागरिक किंवा आकाश (अली फजल) ही पात्रं तेवढ्या परिपूर्णतेनं उभी राहत नाहीत. काजोल (कोंकणा सेनशर्मा) व माँटी (पंकज त्रिपाठी) यांच्या ट्रॅकला जरा जास्तच महत्त्व दिलंय. त्यामुळं तो ताणल्यासारखा झाला आहे, तर याउलट चुमकी (सारा अली खान) आणि काजोलची टीनएजर मुलगी यांचे ट्रॅक काहीसे अर्धवट राहिल्यासारखे झाले आहेत.
असं असलं तरी पहिल्या सिनेमाप्रमाणे यातही प्रीतम आणि त्याचा ऑर्केस्ट्रा महानगरांत, कुठे रस्त्यावर, कुठे टेरेसवर, कुठे पात्रांच्याच आजूबाजूला, कुठे पार्टीत गात गात सिनेमा पुढं नेतो. हा सिनेमा म्हणजे स्वतंत्रपणे एक ‘म्युझिकल’ आहे असं म्हणावं इतकं यातलं संगीत अविभाज्य आहे. यातले शब्द लक्षात राहिले नसले तरी सिनेमात ऐकताना ते चांगले वाटत होते. किंबहुना प्रत्येक पात्राची कहाणी या छोट्या छोट्या गाणुल्यांमधून आपल्यासमोर येते. कधी कधी या गाण्यांचा अतिरेकही होतो. त्यात संगीत प्रीतमचं असल्यामुळं ते कंठाळी आहे हेही वेगळं सांगायला नको. मात्र, असं असलं तरी या सिनेमात ते खपून गेलंय. या सिनेमातल्या पात्रांच्या मनात सुरू असलेला कल्लोळच जणू त्या कंठाळी वाद्यमेळांतून आपल्यावर आदळतोय, असंही वाटून गेलं. आता हे प्रीतमनं हेतुत: केलंय की नकळत झालंय ते आपल्या आपण ठरवावं.
सिनेमाच्या नावात ‘मेट्रो’ असल्यानं तो स्वाभाविकपणे भारतातल्या दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, कोलकाता व पुणे या पाच प्रमुख महानगरांत घडतो. (पुण्यात चुमकी व काजोलचं माहेर असलं, तरी ते एका घरापुरतंच दिसतं. सिनेमात मुंबई, कोलकता जसं ‘दिसतं’ तसं पुणे शहर ‘दिसत’ नाही. त्यामुळं ते इथं फक्त उल्लेखाच्या पातळीवरच राहतं.) याशिवाय या शहरी गोंगाटावर उतारा म्हणून कालका-शिमला ट्रेन आहे आणि समुद्राशिवायचा गोवाही आहे. याशिवाय बरंच काही आहे. महानगरी जगण्याची पार्श्वभूमी बऱ्याच फ्रेम्समधून दिसत राहते. मग ती मेट्रो असेल, उंच उंच इमारती असतील, कॉर्पोरेट ऑफिस असेल किंवा रस्त्यावरची वाहतूक असेल. कोलकत्यात ट्राम आवर्जून दिसते. मुंबईतल्या दृश्यांत उंच उंच इमारती आणि मुंबईचा झगमगाट दिसतो. दिल्ली, बंगळुरूतही तिथली मेट्रो आणि महत्त्वाची ठिकाणं नेपथ्य म्हणून दिसत राहतात. या सर्व दृश्यांमुळे सिनेमातल्या पात्रांच्या मनातल्या कल्लोळाला योग्य तो कॅनव्हास मिळतो. 

यातली काजोल आणि माँटीची गोष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्यासोबत राहते. ती जरा ताणलेली आहे आणि त्यामुळे नंतर जरा कंटाळवाणी आणि काहीशी प्रेडिक्टेबल वाटते. त्या तुलनेत पार्थ आणि चुमकीचा ट्रॅक अधूनमधून येत असला तरी तो जास्त फ्रेश आणि ‘खरा’ वाटतो. गंमत म्हणजे यातलं पार्थ हे पात्र मात्र तसं नाही. ते काहीसं ‘अनरिअल’ किंबहुना आपल्याला आपण जसं व्हावं असं वाटतं, पण होऊ शकत नाही, त्या धर्तीवरचं वाटतं. वर म्हटल्याप्रमाणे लिखाणातही या पात्राला चांगला न्याय मिळाला असल्यानं ते शेवटपर्यंत भाव खाऊन जातं. त्या तुलनेत पंकज त्रिपाठीचा ‘माँटी’ मात्र सतत मार खात राहतो. त्या पात्राच्या मूर्खपणामुळे त्याच्याविषयी सहानुभूतीही वाटत नाही. अनुपम खेरला फारसं फुटेज नसलं तरी त्यानं आणि नीना गुप्तानं मिळालेलं काम नेहमीच्या जोशात केलं आहे. त्यांच्यातली एनर्जी अफाट आहे. फातिमा सना शेख आणि अली फजलचा ट्रॅकही विस्कळित झाला आहे. कदाचित त्यांच्यातल्या विस्कळित संबंधांसारखाच. 
सुरुवातीला या सर्व पात्रांचं इंट्रोडक्शन येतं, तेव्हा या सर्व कथा स्वतंत्र आहेत की काय, असं वाटतं. मात्र, नंतर हळूहळू ही पात्रं एकमेकांशी संबंधित आहेत हे कळतं. काही पात्रं थेट एकमेकांशी संबंधित नसली तरी त्यांचे रस्ते एकमेकांना छेदून जातात. कुठे ना कुठे, कुणी ना कुणी एकमेकांना भेटत राहतं. ही सगळी गुंतागुंत दिग्दर्शकानं नीट हाताळली आहे. (तरी एकदा पंकज त्रिपाठी कार चालवत असताना अचानक अली फजल त्याच्या कारसमोर येतो, तेव्हा त्याला ‘अरे गुड्डू’ असा डायलॉग (संदर्भ - मिर्झापूर ही वेबसीरीज) देण्याचा मोह दिग्दर्शकाला आवरलेला नाही.)
यातल्या तरुण पिढीचं चित्रण स्वतंत्रपणे कौतुकास्पद आहे. यातल्या तिघींचे व्हिडिओ कॉल सुरू असताना त्यातली जी सर्वांत तरुण आहे (चुमकी) तिच्या फोनची बॅटरी अगदी संपत आलेली असते, हेही दिसतं. (‘जेन झी’च्या मुलांच्या फोनच्या बॅटरी कायम लो असतात आणि ज्येष्ठ नागरिक आपले मोबाइल सतत चार्ज करून ठेवतात, असं एक इंटरेस्टिंग निरीक्षण आहे.) आता हे दिग्दर्शकानं मुद्दाम केलं की ते नकळत तसं चित्रित झालंय हे माहिती नाही. मात्र, बारकाईने पाहिल्यास हे दिसतं खरं. यातल्या काजोल व माँटीच्या टीनएजर मुलीचा ट्रॅक त्या दृष्टीनं पाहण्यासारखा आहे. आपल्याला मुलं आवडतात की मुली याचा निर्णय ही पंधरा वर्षांची मुलगी करू शकत नसते आणि तिच्या आयुष्यातला तो सर्वांत मोठ्ठा प्रॉब्लेम असतो. हा ट्रॅक दिग्दर्शकानं म्हणावा तसा खुलवलेला नाही. तो काहीसा मुग्धच राहिला आहे. 
असं सगळं असलं तरी हा सिनेमा आवर्जून पाहा. कथेला महत्त्व असलेला, अनेक कलाकारांचा समावेश असलेला तरी एकही ‘सुपरस्टार’ नसलेला, एकही ‘आयटेम साँग’ नसलेला, शक्य असूनही एकही अश्लील किंवा तुलनेनं बोल्ड दृश्य नसलेला असा हा एक स्वच्छ, पण अंतर्मुख करायला लावणारा सिनेमा आहे. सिनेमा अगदी शंभर टक्के परिपूर्ण नाही, हे खरंच; पण पावणेतीन तासांचा असूनही ‘बोअर’ होत नाही, हेही खरं. त्यामुळं आपल्या आवडत्या व्यक्तीसह मोठ्या पडद्यावरच पाहावा, हे नक्की. 

(दर्जा - साडेतीन स्टार)

----