31 Jul 2019

मन-मितवा - भाग ४ ते ६

मन-मितवा

--------------------

माझ्या स्नेही प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांच्या विनंतीवरून ‘मनशक्ती’ मासिकात मी फेब्रुवारीपासून ‘मन-मितवा’ या नावाचं एक सदर लिहितो आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या हलक्याफुलक्या लेखनापेक्षा हे लेखन जरा वेगळं आहे. मनाशी साधलेला संवाद असं त्याचं स्वरूप आहे. यातही गणू गणपुले आहेच. पण लेखनाचा बाज किंचित वेगळा आहे. त्या मासिकात प्रसिद्ध झालेले पहिले तीन भाग पूर्वी ब्लॉगवर प्रसिद्ध केले आहेत. आता भाग ४ ते ६ देत आहे. आपल्याला हे लेखन आवडेल, असा मला विश्वास आहे.

-----

४. सहेला रे...
--------------------

मनाच्या ‘सीसीटीव्ही’ची गंमत कळताच गणूला मजा वाटली. आता मनाच्या सीसीटीव्हीत अधूनमधून पाहायचं त्यानं ठरवून टाकलं. आपल्या मनाच्या गमतीशीर लीला पाहताना त्याला आता नव्यानं काही काही गोष्टी कळू लागल्या. एक तर या सीसीटीव्हीतून काहीच सुटत नाही, हे एक! त्यामुळं आता मनाशी लपाछपी खेळण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यामुळं आपल्याला जे जे वाटतं, ते मनाला सांगावं आणि त्याच्या मनात काय आहे, त्याला काय वाटतं, हे त्याच्याकडून ऐकावं हेच योग्य, असं गणूनं ठरवून टाकलं. ‘मन क्यूं बहका रे बहका...’ हे गाणं त्यानं आपल्या मेमरीकडून कायमचं डिलीट करून टाकलं. आयुष्यात पुन्हा एकदा शहाण्या, सरळ, पापभीरू माणसासारखं वागायचं, असंही त्यानं पक्कं ठरवलं. काही दिवस आनंदात गेले. मनही खूश होतं. ते स्वत:हून कधी गणूशी बोलत नसे; पण गणूला त्याच्या मूडचा अंदाज येत असे. ‘सीसीटीव्ही’च्या परिणामामुळं आपल्यात हा बदल झालाय, हे गणोबाला कळत होतं. त्यामुळंच त्याच्या मनाचंही बरं चाललं होतं. अधूनमधून फिरकी घेणारं त्याचं मनही अगदी शहाण्या मनासारखं वागू लागलं होतं. विमान एका विशिष्ट उंचीवर गेल्यावर ‘ऑटो-पायलट’ मोडवर टाकतात आणि मग वैमानिक अगदी झोपूही शकतो, तसं गणूनं स्वत:ला व स्वत:च्या मनाला ‘ऑटो-पायलट’ मोडवर टाकून दिलं. पण गंमत अशी, की एखाद्या हायवेवरून कार चालवताना अगदी सरळसोट रस्ता असेल, तर ड्रायव्हरला झोप लागू शकते. कंटाळा येऊ शकतो. त्यामुळं रस्ता कसा ‘वळणदार’ हवा! गणूला ‘ऑटो-पायलट’ मोडवाला सरळसोट रस्ता कालांतरानं बोअर व्हायला लागला होता. आपल्या मनाला हे असलं मिळमिळीत जगणं कंटाळवाणं वाटत नाही का, असा प्रश्न गणूला पडला. फार दिवस मनाशी गप्पा झाल्या नव्हत्या. मग एके दिवशी गणोबांनी बाइक काढली आणि शहराच्या बाहेर हायवेलगत असलेल्या त्या तळ्यापाशी येऊन ते बसले. इथं थोडीफार बाग केली होती; बाक टाकले होते. इथं पर्यटकांची लगबग असतेच. पण तुलनेनं हा भाग जरा शांत होता. त्यात दुपारची वेळ होती. गणूनं आपला नेहमीचा कोपऱ्यातला बाक पकडला आणि तो ‘चिंतन मोड’मध्ये गेला. अशा वेळी त्याला आधी हेडफोनवर किशोरी किंवा कुमार गंधर्व ऐकायची सवय होती. किशोरीताईंचा एखादा राग किंवा कुमारांचं एखादं निर्गुणी भजन ऐकलं, की त्याला शांत शांत वाटत असे. तसं आत्ताही त्यानं मोबाइलमधून कुमारांचं ‘शून्य गढ शहर’ लावलं आणि तो डोळे मिटून ते ऐकायला लागला. कुमारांच्या त्या आवाजातून योग्य तो परिणाम साधला जाऊ लागला. त्याला एकदम शांत शांत वाटू लागलं. आपलं शरीर एकदम हलकं झालं असून, आपण ढगांवरून तरंगत चाललो आहोत, असाही भास त्याला झाला. अशी ‘झीरो ग्रॅव्हिटी’ची अवस्था कायम लाभायला हवी, असं त्याला वाटू लागलं...
मनाशी गप्पा मारायला हीच योग्य वेळ होती. गणूनं डोळे न उघडता, ढगांवरून उडत असल्याचा फील कायम ठेवून मनाला विचारलं, ‘काय मनोबा, बरंय का?’
गणूचं मन गाणं ऐकण्यात गुंगलं होतं. ते जरा दचकलं. म्हणालं, ‘श्शू... शांत बस... ऐकू दे हे...’ 
मग गणू एकदम शांत बसला. पण गाणं संपल्यावर त्याला राहवेना.
‘ऐक ना, ए मन्या,’ गणू मनाला हाक मारत म्हणाला.
‘हं, बोल आता... तुला आली म्हणायची माझी आठवण...’ गणूचं मन उत्तरलं.
‘घ्या... तुमचं हे असं आहे. बोललो तरी तुला प्रॉब्लेम, नाही बोललो तरी प्रॉब्लेम... माझ्यासारख्या गरीब माणसानं करावं तरी काय?’ गणू चिडचिडला.
‘हा हा हा... गणोबा, गंमत केली. एवढं कळतं ना...’ मन खदखदा हसत म्हणालं. गणू आणखी चिडचिडा झाला.
आता संध्याकाळचं ऊन थेट तोंडावर यायला लागलं. त्यामुळं त्याच्या त्रासात भरच पडली. तो एक हात डोळ्यांवर ठेवून म्हणाला, ‘कळते हो, सगळी गंमत कळते. गेली काही वर्षं तुम्ही आमची जी गंमत चालविली आहे ना, ती केवळ थोर आहे हो!’
यावर गणूचं मन म्हणालं, ‘मी कुणाचीही गंमत करायला जात नाही. पण माझ्यापासून लपवून गोष्टी करणाऱ्यांची गंमत मात्र मी बघत बसतो हे नक्की.’
गणू म्हणाला, ‘माहिती आहे. गेले काही दिवस आपण त्यावरच बोलतोय आणि आता माझ्या मते, तो प्रश्न मिटला आहे. आता आपली गाडी फारच सरळ निघाली आहे. मी इकडं-तिकडं कुठंही पाहत नाहीये... मी आणि तू... आपण दोघे एकमेकांना बरे... एवढाच विचार मी केलाय. पण खरं सांग मनोबा, कंटाळा आला की नाही?’
‘सरळसोट जगणं कंटाळवाणं वाटतं, हाच तुमच्या जगण्याचा पेच आहे,’ गणूचं मन गंभीर होत म्हणालं. ‘तुम्हाला सदैव थ्रिल पाहिजे. साध्या गोष्टींना तुम्ही भुलत नाही, तुमचं पोट भरत नाही. तुम्हाला सदैव काही तरी वेगळं पाहिजे. सतत नवं पाहिजे. तुमच्या या घाटदार जगण्याच्या अपेक्षांनी मी केवळ स्तिमित झालो आहे...’ मन चिंतनशील होऊन बोलत राहिलं...
गणू ऐकत राहिला. सरळ जगणं हा पेच वाटतोय का आपल्याला? काय घडलं म्हणजे आपल्याला ‘मज्जा’ येईल? 
गणूला ठरवता येईना. अशा वेळी मनाला शरण जाणं हाच एक उपाय असतो. गणूनं तेच केलं.
‘मग काय करायचं म्हणता महाराजा? हा सरळ जगण्याचा आडवळणी पेच सुटायचा कसा?’
मन म्हणालं, ’सोपं आहे. साधं-सरळ जगून पाहणं हेच एक थ्रिल आहे, असं समजायचं...’
गणू काय ते समजला. त्यानं शांतपणे डोळे मिटले. ‘सहेला रे...’ सुरू झालं... तो आणि त्याचं मन किशोरीच्या स्वरात डुंबून गेलं... समोर सूर्य अस्ताला निघाला होता आणि आसमंत शांत शांत होत होता....

(क्रमश:)

----

५. पर्जन्यसूक्त
-------------------

गणूला पाऊस आवडतो. धुवाँधार कोसळणारा पाऊस सुरू झाला, की हातातली सगळी कामं बाजूला ठेवून त्या अविरत कोसळणाऱ्या जलधारांकडं पाहत बसायला त्याला आवडतं. उन्हाळा हा त्याचा अत्यंत नावडता ऋतू होता. तेव्हा कधी एकदा उन्हाळा संपतो आणि पाऊस येतो असं त्याला होऊन जातं. माणसं शब्दाला जागत नाहीत, वचनं विसरतात, शपथा मोडतात; पण निसर्ग असं कधीही करत नाही. तो त्याच्या ठरलेल्या वेळेला येतोच. कधी तरी प्रतीक्षा करायला लावतो हेही खरं. पण अजिबातच यायचं नाही, असं तो कधीही करत नाही. त्यामुळं मे महिना संपला आणि जून उजाडला, की गणूला पर्जन्यऋतूचे वेध लागतात. अशा धुवाँधार पावसात बाइक काढायची आणि डोंगर-दऱ्यांत हिंडायला जायचं ही गणूची आवडती सवय. हल्ली पावसाळ्यात त्याच्या शहराजवळचं एकही ठिकाण निर्मनुष्य उरत नाही. निसर्गाला कडकडून भेटायला सगळेच आतुर! पण मग शांतता नसेल, तर संवाद व्हायचा कसा? मग गणूनं शोधून शोधून काही ठिकाणं वेचून काढली होती. ती अजून तरी फार कुणाला माहिती नव्हती. आषाढातल्या संततधारेची छान अशी झड लागली, की गणू बाहेर पडायचाच. सचैल भिजत तो गाडीवरून दूर दूर जात राहायचा. मग त्याचं आवडतं ठिकाण आलं, की गाडी उभी करून, तिथल्या एका आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर तो बसायचा. समोर भाताची शेतं आणि त्यापलीकडं डोंगर... त्यावरून येणारे शुभ्रफेसाळ धबधबे. गणूला समाधी अवस्था प्राप्त व्हायची अशा वेळी! 
....आणि, ‘हीच ती वेळ गणूशी बोलायची,’ असं म्हणून गणूचं मन त्याच्याशी संवाद साधू लागायचं. त्या दिवशीही असंच झालं...
‘काय गणोबा, बरं वाटतंय का?’ मनानं विचारलं.
‘हं...’ गणू उत्तरला. 
‘लागली का समाधी?’
‘हं...’ गणू अशा वेळी एकाक्षरी उत्तरं द्यायचा.
‘का आवडतं रे तुला इथं यायला?’ मन प्रश्न विचारायचं सोडत नव्हतं.
‘हे बघ, मला जरा शांत बसू दे आणि तूही शांत हो बरं...’ गणू वैतागून मनावर ओरडला.
‘हो रे बाबा, बसतो बापडा शांत... पण कधी तरी मला हे सांग. मला तुझ्याकडून ऐकायचंच आहे...’ मनानं आपला हट्ट चालू ठेवला.
‘बरं ऐक...’ गणू शेवटी कंटाळून म्हणाला, ‘मला ना निसर्ग आवडतो. याचं कारण म्हणजे तो आपल्याला देण्यात कधीच कुचराई करत नाही. तो कधीही आपल्याला फसवत नाही. आपल्याला काही मागत नाही. सदैव दात्याच्या भूमिकेत असतो. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे निसर्ग म्हणजे या पृथ्वीतलावरची प्युअरेस्ट, सर्वांत शुद्ध गोष्ट आहे. आता हे पावसाचं पाणीच बघ. वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झालेलं आहे, की जमिनीवर पडण्यापूर्वीचं पावसाचं पाणी हे पाण्याचं सर्वांत शुद्ध रूप असतं. माहितीय का? तर मला हे निसर्गाचं प्युअर असणं, शुद्ध असणं फार आवडतं.’
‘व्वा...’ मन कौतुकानं म्हणालं, ‘म्हणजे जे आपल्याला होता येत नाही, ते आपल्याला आवडतं तसंच ना रे हे!’
गणू एक मिनिट विचारात पडला. त्यानं मनाला विचारलं, ‘म्हणजे काय म्हणायचंय तुला?’
‘अरे, साधी गोष्ट आहे. निसर्ग शुद्ध आहे आणि आपण तितके शुद्ध, तितके प्युअर कधीच नसतो. हां, फार तर जन्मल्या जन्मल्या पहिली तीन-चार वर्षं आपण तसे असू. पण नंतर आपण नाना विकारांनी ग्रस्त होतो. आपल्यातली शुद्धता लोप पावते आणि आपण हळूहळू सर्व बाबतींत करप्ट व्हायला लागतो.’
‘हं... खरंय तुझं. म्हणूनच या शुद्धतेची ओढ लागत असावी,’ गणू म्हणाला.  
गणूचं मन म्हणालं, ‘पण आपण लबाड असतो रे. आपल्याला ही शुद्धता आपल्या अंगी बाणवायला नकोच असते. फक्त मनातला अपराधभाव फार वाढला, की असे पावसाचे चार थेंब अंगावर घेतल्यासारखी ती आपल्याला थोडा वेळ हवी असते. मग आपण आपलं समाधान झालं, की अंग खसखसा पुसून कोरडं करतो, तशीही ही शुद्धताही पुन्हा झटकून टाकतो आणि आपल्या मूळच्या मलीन जगण्याकडं वळतो.’
‘पण याला कुणीच अपवाद नाहीय. मीही इतरांसारखाच माणूस आहे. मग माझंही तसंच झालं तर त्यात वेगळं काय घडलं?’ गणू मनाला विचारता झाला.
‘वेगळं काहीच घडत नाही, हेच तर दुखणं आहे ना माझं,’ मन वैतागून म्हणालं. 
‘काय म्हणायचंय काय तुला?’ गणूनं शंकेनं विचारलं.
‘अरे, सगळे जण असाच विचार करतात ना, त्याची गंमत वाटली. मी सर्वसामान्य आहे, इतरांसारखाच आहे असाच विचार सगळ्यांनी केला, तर त्यातून वेगळा विचार करणारा कुणी निपजणारच नाही,’ मन आपला मुद्दा स्पष्ट करीत म्हणालं.
‘अरे, एवढा सुंदर निसर्ग आहे... सुंदर धबधबा कोसळतोय समोर आणि तू हे काय तत्त्वज्ञानाचं व्याख्यान लावलं आहेस?’ गणू त्रस्त होऊन विचारता झाला.
त्यावर मन शांतपणे म्हणालं, ‘नाही, नाही... तू आनंद लूट... तुला ही संधी फार कमी वेळा मिळते, हे मी अनेकदा पाहिलंय. माझं मात्र तसं नाही. तुझ्या भल्यासाठी मला सतत काही तरी विचार करणं भागच आहे.’
गणू थोडासा विचारात पडला अन् म्हणाला, ‘एवढा माझा विचार करतोस? मी मात्र तुझा विचार करत नाही....’
‘असं नाहीय. तू इथं आलास हेही खूप आहे माझ्यासाठी. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तू स्वत:साठी म्हणून जो खास वेळ काढतोस ना, तो माझ्यासाठीही असतोच. तेव्हा मी सदैव तुझ्याच सोबत असतो,’ मन हसत बोललं...
‘हं...’ गणू शांतावत उत्तरला.
‘आता एकच गोष्ट कर,’ मन म्हणालं.
‘काय करू सांग,’ गणू म्हणाला.
‘या पावसानं ही जमीन कशी स्वच्छ धुतली गेलीय ना, तसा तूही आतून-बाहेरून शुद्ध हो, निर्मळ हो... बघ जमतंय का?’ मनानं गणूला सुचवलं.
गणू समजून शांतपणे हसला. समाधानानं हसला.
आता समोर पाऊस आणखीन आवेगानं कोसळत होता. धबधबा बेफामपणे खाली झेपावत होता... 
...आणि गणू व त्याचं मन एकाच वेळी समाधी अवस्थेत पोचले होते!

(क्रमश:)

---

६. स्वातंत्र्य *
----------------


ऑगस्ट महिना उजाडला, की गणूला स्वातंत्र्यदिनाचे, तर त्याच्या मनाला श्रावणाचे वेध लागतात. स्वातंत्र्यदिनाचं आणि अर्थातच स्वातंत्र्याचं महत्त्व गणू जाणतो. त्याच्या जन्माच्या वेळी देश स्वतंत्रच होता. त्यामुळं पारतंत्र्य म्हणजे काय, हे त्याला खरं तर माहिती नाही. पण आपल्याला हवं ते करण्याचं स्वातंत्र्य नाही आणि दुसऱ्या कोणाच्या तरी तालावर आपल्याला नाचावं लागेल ही कल्पनाच गणूला सहन होत नव्हती. यथावकाश गणूचं लग्न झालं आणि... मग सगळंच बदललं! गणूला स्वातंत्र्य, पारतंत्र्य आदी सगळ्या संकल्पनांचे अर्थ नीटच समजू लागले. गणूला विवाहोत्तर आयुष्यात जे काही कथित स्वातंत्र्य मिळालं होतं, ते म्हणजे एखाद्या वाघाला प्राणिसंग्रहालयातील मोठ्या पिंजऱ्यात फिरण्याचं स्वातंत्र्य होतं, हे त्याला खूप उशिरा कळलं. गणूचं मन त्याला याबाबतीत नेहमी हसत असे. गणूला त्याच्या विवाहपूर्व काळाची आठवण करून देत चिडवणं हा गणूच्या मनाचा आवडता छंद होता. 
नागपंचमीच्या दिवशी अर्धांगानं केलेली पुरणाची दिंडं रेटून गणू एखाद्या अजगरासारखा दुपारी लोळत होता. बाहेर पावसाची संथ, बारीक धार आणि पुरण खाऊन डोळ्यांवर आलेली सुस्ती अशा वातावरणात गणूचं मन नेहमीच त्याला बेसावध गाठत असे. 
आताही तेच झालं. मन म्हणालं, ‘झालं का मनसोक्त गोडधोडाचं जेवण? माझाही जरा विचार करा...’
गणू म्हणाला, ‘पूर्वी मी तुझाच विचार करून खायचो. तुला जे आवडेल ते आणि तेवढं. मला आता मला दुसरं कुणी तरी सांगतं, की हे खाऊ नका, ते खाऊ नका. गोड कमी खा, वजन कमी करा इत्यादी इत्यादी...’
मन म्हणालं, ‘अरेरे, हे तर पारतंत्र्य झालं. आणि गणोबा, तुमचं पारतंत्र्य म्हणजे आमचं मरणच की!’
गणू उत्तरला, ‘आधी मी मनसोक्त जगलो. त्यामुळं आता निर्बंध सोसावे लागताहेत... आधी तुझा विचार केला, आता मला माझ्या शरीराचा विचार करू दे.’
मन खट्टू होत म्हणालं, ‘तेव्हाही मी तुला म्हटलं नव्हतं, की शरीराला अपाय होईल, असं वाग म्हणून... आता उगाच माझं नाव का घेतोस?‘
गणू म्हणाला, ‘असंच असतं. स्वातंत्र्याची किंमत म्हण हवं तर... वाल्या कोळ्याच्या पापात सहभागी व्हायला त्याचं कुटुंबही तयार झालं नाही. इथंही तसंच आहे. तुला खूश ठेवून मला तोटा होणार असेल, तर तुला खूश ठेवणं अवघड आहे.’
मन विचारात पडलं आणि बोललं, ‘पण मला खूश ठेवून तुला तुझ्या शरीरालाही खूश ठेवता येईलच की.’
गणू म्हणाला, ‘ते कसं काय?’
मन उत्तरलं, ‘तू स्पायडरमॅन सिनेमा पाहिलायेस का? त्यात एक वाक्य आहे बघ. ग्रेट पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी!’
गणू वैतागला, ‘हो माहितीय की! त्याचं काय इथं?’
गणूचं मन हसत म्हणालं, ‘अरे? संबंध नाही कसा? स्वातंत्र्य म्हणजे एक प्रकारची सत्ताच असते की नाही, तुमच्या हाती आलेली? मग स्वातंत्र्य मिळालं, की ते नीट उपभोगण्याची जबाबदारीही येतेच ना... त्यामुळं तुला शरीरासोबत मनालाही खूश ठेवावंच लागणार... आम्ही दोघंही तुझाच भाग आहोत ना!’
गणू हताश होत म्हणाला, ‘हे कुणाला जमेल असं वाटत नाही. शरीराला खूश केलं, की मन नाराज आणि मनाला खूश केलं, की शरीर कुरकुर करणार... अवघड आहे.’
मन म्हणालं, ‘अवघड आहेच. जगात काहीच सोपं नाही. स्वातंत्र्य मिळवणं सोपं नाही आणि मिळवलेलं टिकवणं तर त्याहून नाही.’
गणू म्हणाला, ‘मग यावर उपाय काय? तूच सांग बाबा. पुनश्च शरण येतो.’
मन हसून म्हणालं, ‘मी म्हणजे तूच आहेस. मला शरण येऊ नकोस. स्वत: विचार कर. तुला मिळालेलं स्वातंत्र्य नीट वापरतो आहेस ना? स्वातंत्र्यासोबत येणारी जबाबदारी व्यवस्थित पार पाडतो आहेस ना?’
गणू म्हणाला, ‘खरंय तुझं. आम्हाला स्वातंत्र्य हवं असतं आणि ते कसं वापरायचं याचंही परत स्वातंत्र्य हवं असतं. स्वातंत्र्याच्याही ‘अटी व शर्ती’ असतात हे आम्हाला माहितीच नाही.’
मन सांगू लागलं, ‘अटी व शर्ती असतात, हे बरोबर. पण त्या तुझ्याच चांगल्यासाठी असतात, हे लक्षात ठेव.’
गणू म्हणाला, ‘शब्दांचे फुलोरे खूप छान फुलवता येतात तुला. प्रत्यक्ष जगणं तुझ्या आदर्शवादी शब्दांपेक्षा खूप अवघड आहे, एवढंच लक्षात ठेव. तिथं मला लढावं लागतं.’
मन म्हणालं, ‘तुझ्या प्रत्येक लढाईत मी तुझ्या सोबत आहे, हे कायम लक्षात असू दे. फक्त माझ्यापासून लपवून काही करू नकोस. तुझं स्वातंत्र्य हे माझंही स्वातंत्र्य आहे. त्यामुळं तुझ्या स्वातंत्र्याची जास्त किंमत मलाच आहे.’
गणू म्हणाला, ‘हं, आलं लक्षात. स्वातंत्र्य मला मिळालं असलं, तरी मी त्याचा वापर विचारपूर्वक केला पाहिजे. माझ्या स्वातंत्र्यामुळं दुसऱ्याचं स्वातंत्र्य, उदा. तुझंच - धोक्यात येत नाहीये हेही मी पाहायला पाहिजे.’
मन म्हणालं, ‘बरोब्बर. गणू, तुझं कसं आहे, माहितीय का! तुला सगळं कळतं... पण वळत नाही काहीच.’
गणू हसत म्हणाला, ‘मग तू कशाला आहेस?’
मन म्हणालं, ‘मी आहेच कायम. आत्ताही सांगितलंच की तुला. तुला स्वातंत्र्यदिन आवडतो ना, तसा मला श्रावण आवडतो. हा श्रावण म्हणजे निसर्गाचा फार सुंदर आविष्कार आहे. मस्त पाऊस पडत असतो, सगळी सृष्टी हिरवीगार झालेली असते, आपल्याही चित्तवृत्ती प्रफुल्लित झालेल्या असतात. सगळीकडं सर्जनाचं मोहक वातावरण असतं. मला असं आवडतं. हे सगळं खूप नैसर्गिक आणि म्हणूनच खूप खरं आहे. इथं माणसाच्या जगातल्या फसवणुकीला, दांभिकतेला, छक्क्या-पंजांना जागा नाही.’
गणू वैषम्यानं म्हणाला, ‘माणसाचं आयुष्यही एवढं निर्मळ असतं, तर अजून काय हवं होतं?’
मन हसत म्हणालं, ‘पण प्रयत्न सोडायचे नाहीत. आपल्याला थेट त्या निर्झराच्या पाण्यासारखं व्हायचंय, नितळ अन् पारदर्शक!’
गणू म्हणाला, ‘माझं स्वातंत्र्य आणि तुझा नैसर्गिक सच्चेपणा एकत्र आला तर काय बहार येईल!’
मन म्हणालं, ‘अगदी... कसं बोललास! चल, आता स्वातंत्र्यदिन खऱ्या अर्थानं साजरा करू. बोला, भारतमाता की जय...’

(क्रमश:)

---

(सहावा भाग काही कारणाने अंकात प्रसिद्ध झालेला नाही. तो इथेच वाचायला मिळेल.)

---

27 Jul 2019

मराठी व्याकरण - भाग १ ते ६

मराठी व्याकरण
-------------------

भाग १
--------

सुवाच्य

अक्षर सुवाच्य असावे, असे शिक्षक नेहमी सांगतात. सुवाच्य म्हणजे सहज वाचता येईल असे. यालाच स्वच्छ अक्षर असेही म्हणतात. सु + वाच्य अशी या शब्दाची फोड आहे. वाच्य, वाचन, वाचक हे शब्द एकमेकांशी निगडित आहेत. 'वाच्य' या शब्दाचा मूळ अर्थ बोलण्यास किंवा सांगण्यास योग्य असा आहे. 'सुवाच्य' हा शब्द अनेक जण 'सुवाच्च' असा लिहितात; ती चूक टाळावी. 

---

यच्चयावत

या शब्दाचा अर्थ आहे सर्व, झाडून सगळे. बर्‍याच वेळा हा शब्द 'यच्चावत', 'यच्यावत', 'यच्ययावत' असा निरनिराळ्या पद्धतींनी लिहिलेला आढळतो. या शब्दात 'च'ला 'च' जोडून लिहावा. शब्दाचा उच्चार व्यवस्थित केला की लिहिताना चूक होत नाही.

----

माहात्म्य

माहात्म्य शब्दाचे नाते महात्मा शब्दाशी आहे. महा + आत्मा ही महात्मा शब्दाची फोड आहे. अतिथोर मनाच्या व्यक्तीचे वर्णन करताना आपण हा शब्द वापरतो. माहात्म्य हे भाववाचक नाम आहे. थोरवी हा जसा त्याचा अर्थ आहे, तसेच देवादिकांचा महिमा, प्रताप, वैभव इत्यादी त्याचे अर्थही आहेत. हा शब्द 'महात्म्य' असा लिहिला जाण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी. यातील जोडाक्षरही नीट ध्यानात घ्यावे.

---

प्रथितयश

विशिष्ट क्षेत्रातील कामगिरीमुळे कीर्ती मिळविलेल्या व्यक्तीचे वर्णन करताना 'प्रथितयश' हे विशेषण वापरले जाते. हा शब्द प्रथित आणि यश या शब्दांपासून बनला आहे. 'प्रथित'चा अर्थ 'जाहीर झालेले' वा 'प्रसिद्ध'. 'प्रथित'चे मधील अक्षर 'थि' आहे; 'ति' नव्हे, हे ध्यानात घ्यावे. 'प्रथित' हा शब्द लक्षात ठेवल्यास, प्रथितयश हा शब्द 'प्रतिथयश' असा लिहिण्याची चूक होणार नाही. 

----

विजिगीषा

विजिगीषा या शब्दाचा अर्थ आहे जिंकण्याची इच्छा. हा मूळ शब्द संस्कृत आहे. मराठीतही तो तसाच वापरला जातो. हा शब्द अनेक वेळा विजीगीषा, विजिगिषा, विजिगीशा अशा अनेक पद्धतीने लिहिलेला आढळतो. या शब्दात 'व' व 'ज'वर पहिली वेलांटी व 'ग'वर दुसरी वेलांटी असते. शिवाय शहामृगातला 'श' न लिहिता षट्कोनातला 'ष' लिहावा. 'विजिगीषू' म्हणजे जिंकण्याची इच्छा बाळगणारा. 

----

भाग २
--------

अनसूया

अनसूया हे नाव तुम्ही ऐकले असेल. अनुसया असाही शब्द ऐकला असेल. अनुसया हा 'अनसूया'चा अपभ्रंश. अनसूया हा शब्द शुद्ध. तो लक्षात राहण्यासाठी त्याची फोड (अन् + असूया) लक्षात घ्यावी. यात न् आणि अ यांचा संधी होऊन न झाला आहे. अन् हा नकारार्थी उपसर्ग. असूया म्हणजे मत्सर. अनसूया म्हणजे निर्मत्सरी, निष्कपटी. अनसूयक या विशेषणाचाही तोच अर्थ आहे.

---

अनिर्वचनीय

अनिर्वचनीय या शब्दाचा अर्थ आहे अवर्णनीय. अनिर्वाच्य असाही शब्द याच अर्थाने वापरतात. एखाद्या गोष्टीचे वर्णन शब्दांत करणे अवघड असते, तेव्हा केवळ अवर्णनीय असे म्हटले जाते. हा शब्द लिहिताना अनिरवचनीय, अनीर्वचनीय, अर्निवचनीय असा चुकीचा लिहिला जाण्याची शक्यता असते. 'न'ला पहिली वेलांटी व रफार 'व'वरच द्यावा.

---

अपर

अपर हा संस्कृतमधून आलेला शब्द आहे. अधिक, दुसरा, नंतरचा इत्यादी अर्थांनी तो वापरला जातो. 'पश्चिमेकडील' असाही त्याचा एक अर्थ आहे. त्यावरूनच अपरांत (कोकण) हा शब्द बनला आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या काही पदांमध्ये अतिरिक्त या अर्थाने 'अपर' हा शब्द वापरला जातो. ( उदाहरणार्थ अपर जिल्हाधिकारी). 'अप्पर' या इंग्रजी शब्दाचा 'अपर'शी काहीही संबंध नाही, हे लक्षात घ्यावे.

---

अरिष्ट

अरिष्ट या संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ आहेत. आपत्ती या अर्थाने तो मराठीत वापरला जातो. 'अरिष्ट' कोसळणे असा शब्दप्रयोग केला जातो, विशिष्ट प्रक्रियेनंतर जे औषध तयार केले जाते, त्यालाही अरिष्ट असे म्हणतात. या शब्दात 'अ' ऐवजी 'आ' लिहिला जाण्याची चूक संभवते, तसेच 'र'ला चुकून दुसरी वेलांटी दिली जाण्याचीही शक्यता असते. या दोन्ही चुका होणार नाहीत, असे पाहावे.

---

विच्छिन्न

हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ आहे वेगळा केलेला, तोडलेला, मोडलेला. या शब्दात जोडाक्षरांकडे विशेष लक्ष द्यावे. 'च'ला 'छ' आणि 'न' ला 'न' जोडावा. शिवाय दोन्ही अक्षरांना पहिली वेलांटी द्यावी. 'विछिन्न,' 'वीच्छिन्न' असे लिहू नये.

---

अग्रिम

अग्रिम हा शब्द इंग्रजीतील अॅडव्हान्स शब्दाला प्रतिशब्द म्हणून वापरला जातो. अग्रिम हा संस्कृतमधून आलेला शब्द आहे. अग्र या शब्दापासून तो बनला आहे. अग्रच्या अर्थांमध्ये पहिला, पुढे आलेला आदींचा समावेश आहे. 'आधीचा', पहिला, श्रेष्ठ, प्रथम पिकलेला हे अग्रिम शब्दाचे अर्थ आहेत. अग्रिम वेतन म्हणजे आगाऊ दिलेले वेतन. रक्कम या संदर्भातच या शब्दाचा प्रामुख्याने वापर होतो.

---

अजित

अजित म्हणजे अजिंक्य. जित म्हणजे पराभूत; जिंकला गेलेला. त्याच्या उलट अर्थाचा शब्द अजित (अ + जित). विष्णू, शिव, बुद्ध असेही 'अजित'चे अर्थ आहेत. या शब्दात 'ज'वर पहिली वेलांटी आहे. चुकून ती दुसरी लिहिली गेली, तर अर्थ बदलतो. 'अजीत'चा अर्थ 'न कोमेजलेले' असा आहे. अपराजित याही शब्दाचा अर्थ अजिंक्य. 'अपराजित'मध्येही 'ज'वर पहिली वेलांटी आहे.

---

भाग ३
--------

उपाहार

उपाहार (उप + आहार) म्हणजे फराळ. (इंग्रजीत 'रिफ्रेशमेंट'.) उपाहारगृह हा शब्द त्यावरून तयार झाला आहे. त्यात 'उपाहार'ऐवजी 'उपहार' असे चुकीचे लिहिले जाते. येथे 'पा'चा 'प' झाला, की अर्थ बदलतो. उपहार हादेखील सांस्कृत शब्द आहे. त्याचे अनेक अर्थ (भेट, देणगी, आहुती, आरास, आनंद इत्यादी) आहेत. भेट वा देणगी या अर्थाने तो हिंदीत वापरला जातो.

---

आबालवृद्ध

आबालवृद्ध म्हणजे बालांपासून ते वृद्धांपर्यंत; म्हणजेच सर्व वयाची माणसे. हा शब्द अबालवृद्ध असा लिहिण्याची चूक होऊ शकते. मग त्यात अपेक्षित अर्थ उरत नाही. (अबाल हे संस्कृतमधील एक विशेषण आहे. त्याचा अर्थ तरुण; पूर्ण वाढलेला असा आहे.) आबालवृद्ध हा शब्द चुकीचा लिहिला जाऊ नये, यासाठी 'आ' हा उपसर्ग लक्षात ठेवावा. त्याचे जे विविध अर्थ आहेत, त्यांतील पासून आणि पर्यंत हे अर्थ येथे अभिप्रेत आहेत. आपादमस्तक (पायापासून डोक्यापर्यंत), आमूलाग्र (मुळापासून टोकापर्यंत, म्हणजे संपूर्णपणे) हेही शब्द असेच तयार झाले आहेत.

---

अनावृत

आवरण नसलेले, उघडे, जाहीर, प्रकट या अर्थांनी हे विशेषण वापरले जाते. वृ या संस्कृत धातूपासून हा शब्द तयार झाला आहे. वृ चा अर्थ आच्छादणे असा आहे. आवृत म्हणजे आच्छादलेले; आवरण घातलेले. 'आवृत'च्या उलट अर्थाचा शब्द अनावृत. पण 'अनावृत्त' म्हणजे मात्र आवृत्ती नसलेला; पुन्हा न येणारा. अनावृत या शब्दाशी अनावृत्त या शब्दाचा काहीही संबंध नाही.

---

आशीर्वाद

आशीर्वाद देणे म्हणजे दुवा देणे, भले व्हावे अशी इच्छा व्यक्त करणे. आशीर्वाद या शब्दात 'श'वर दुसरी वेलांटी असते. अनेक जण 'श'वर पहिली वेलांटी देऊन 'आशिर्वाद' असे लिहितात. ते चुकीचे आहे, हे लक्षात ठेवावे. तसेच या शब्दातील रफार हा 'वा'वर आहे, 'शी'वर नाही. काही जण चुकून हा शब्द 'आर्शीवाद' किंवा 'आर्शिवाद' असा लिहितात.

---

कोजागरी

आश्विन महिन्यातील पौर्णिमेला 'कोजागरी' म्हणतात. या शब्दाचे मूळ 'को जागर्ति?' ('कोण जागा आहे?') या प्रश्नात आहे. त्या पौर्णिमेच्या रात्री सर्वांना देवी लक्ष्मी हा प्रश्न विचारते, अशी समजूत आहे. जो जागा असतो, त्याला देवी संपत्ती देते, असे म्हणतात. कोजागरी हा शब्द लिहिताना 'ग'ऐवजी 'गि' लिहिला जाण्याची (कोजागिरी) चूक होऊ शकते. ती टाळण्यासाठी 'को जागर्ति?' हा प्रश्न लक्षात ठेवावा.

---

निर्भर्त्सना

एखाद्याची निर्भर्त्सना (निर् + भर्त्सना) करणे, म्हणजे त्याची अतिशय निंदा करणे वा त्याला खूप रागावणे. भर्त्सना या शब्दाचा अर्थ निंदा वा धिक्कार. निर् या शब्दाचे अनेक अर्थ असून त्यांत 'निषेध' हादेखील एक अर्थ आहे. निर्भर्त्सना या शब्दात 'भ'वर आणि 'त्स'वरही रफार आहे, हे लक्षात घ्यावे; म्हणजे 'निर्भत्सना' असा तो चुकीचा लिहिला जाणार नाही.

---

कर्तृत्व

'कर्तृ' या संस्कृत विशेषणाचा अर्थ 'करणारा'. त्यापासून कर्तृत्व हे भाववाचक नाम तयार झाले आहे. कर्तेपणा, सामर्थ्य, कार्य करण्याची क्षमता या अर्थांनी कर्तृत्व हा शब्द वापरला जातो. यातील दुसरे अक्षर नीट लक्षात ठेवा. हा शब्द 'कतुर्त्व' किंवा 'कर्तुत्त्व' किंवा 'कर्तुत्व' किंवा 'कतृत्व' असा लिहिलेला अनेकदा आढळेल; पण हे अपभ्रंश आहेत. 'कर्तृत्व'मध्ये शेवटचे अक्षर 'त्त्व' नसून 'त्व' आहे, हेही ध्यानात घ्या.

---

अधीक्षक

अधीक्षक या शब्दाचा खरा अर्थ देखरेख करणारा. हे सरकारी विभागांतील किंवा खासगी संस्थांमधील एक अधिकारपद आहे. सुपरिंटेंडंट या शब्दाला हा प्रतिशब्द आहे. अधि + ईक्षक अशी याची फोड आहे. ईक्षक म्हणजे पाहणारा. अधि या उपसर्गाचा अर्थ वर, वरच्या बाजूस असा आहे. अधीक्षक या शब्दात 'ध'वर दुसरी वेलांटी आहे, हे लक्षात ठेवावे. (अधिक्षक असे लिहिणे चूक होय.)
---

भाग ४
--------

कोट्यधीश

कोट्यधीश या शब्दाची फोड कोटि + अधीश अशी आहे. 'कोटि' हा संस्कृत शब्द मराठीत कोटी असा लिहिला जातो. त्याचा एक अर्थ शंभर लाख असा आहे. अधीश म्हणजे धनी, मालक. ज्याच्याकडे एक कोटी रुपये वा त्याहून अधिक मालमत्ता आहे, तो कोट्यधीश. हा शब्द 'कोट्याधीश' असा लिहिण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी. कोट्यवधी (अनेक कोटी) याही शब्दातील जोडाक्षर 'ट्य' असे आहे; 'ट्या' नव्हे.

---

अल्पसंख्याक

ज्यांची संख्या अल्प आहे, म्हणजेच तुलनेने कमी आहे, ते अल्पसंख्याक. हा शब्द अनेकांकडून चुकून अल्पसंख्यांक असा लिहिला जातो. अल्पसंख्याक या शब्दाची फोड अल्प + संख्या + क अशी आहे. या शब्दात फक्त 'स'वर अनुस्वार आहे, हे लक्षात घ्यावे. (अल्प + संख्या + अंक अशी फोड नाही.) बहुसंख्याक हा शब्द 'अल्पसंख्याक'च्या विरुद्ध अर्थी आहे. ज्यांची संख्या तुलनेने अधिक, ते बहुसंख्याक.

---

तत्काळ

तत्काळ म्हणजे ताबडतोब. संस्कृतमधील तत्कालम् या शब्दापासून तत्काळ हा शब्द तयार झाला आहे. तत् + कालम् अशी 'तत्कालम्'ची फोड आहे. तत्काळ हा शब्द अनेक जण चुकून 'तात्काळ' असा लिहितात. या शब्दातील पहिले अक्षर 'ता' नसून 'त' आहे, हे लक्षात राहण्यासाठी 'तत्' हा संस्कृत शब्द लक्षात ठेवावा. 'तत्क्षणी' याही शब्दाचा अर्थही ताबडतोब असाच आहे.

---

दुरवस्था

दुरवस्था म्हणजे वाईट अवस्था. हा शब्द अनेक जण चुकून 'दुरावस्था' असा लिहितात. दुरवस्था या शब्दाची फोड दु: + अवस्था अशी आहे. संधी होताना विसर्ग जाऊन 'र्' येतो. 'र्' आणि 'अ' यांचा संधी होऊन 'र' तयार होतो, ही फोड लक्षात घ्यावी. दुर्दशा (दुः + दशा) हा शब्दही त्याच अर्थाने वापरला जातो. अशाच रीतीने दुरुत्तर (दु: + उत्तर), दुर्गंध (दुः + गंध), दुराचरण (दु: + आचरण) इत्यादी शब्द तयार झाले आहेत.

---

अतीत

अतीत म्हणजे होऊन गेलेले, दूर गेलेले. 'मागे टाकणारे' असाही त्याचा एक अर्थ आहे. कालातीत म्हणजे काळाला मागे टाकणारे; काळापलीकडचे. शब्दातीत म्हणजे शब्दांच्या पलीकडचे. अतीत, कालातीत, शब्दातीत या सर्व शब्दांत 'त'वर दुसरी वेलांटी आहे हे लक्षात घ्यावे. (अतित, कालातित, शब्दातित असे लिहिणे चुकीचे.) 'व्यतीत' याही शब्दाचा अर्थ 'होऊन गेलेले' असा आहे. त्याही शब्दात 'ती' दीर्घ असतो.
---

अनिल

अनिल म्हणजे वारा. 'विष्णू' असाही त्याचा एक अर्थ आहे. मराठीत अनिल हे विशेषनाम म्हणून प्रसिद्ध आहे. उच्चारणात चूक होऊन हा शब्द 'अनील' असा चुकीचा लिहिला जाण्याचीही शक्यता असते. 'अनिल' आणि 'सुनील' ही नावे अनेक जण जोडीसारखी वापरतात; पण 'सुनील'मध्ये 'न'वर दुसरी वेलांटी आहे. 'सुनील'चा संबंध नीलवर्णाशी आहे. 'नील'मध्ये पहिले अक्षर दीर्घच असते.

---

सेंद्रिय

सेंद्रिय हा शब्द 'इंद्रिय' या शब्दापासून तयार झाला आहे. 'स + इंद्रिय' अशी त्याची फोड आहे. इंग्रजी भाषेतील 'ऑरगॅनिक'ला हा प्रतिशब्द आहे. सेंद्रिय खते हा शब्द तुमच्या वाचनात आला असेल. शरीराचा अवयव, ज्ञान प्राप्त करून घेण्याचे वा कर्म करण्याचे साधन हे इंद्रिय या शब्दाचे अर्थ आहेत. इंद्रिय व सेंद्रिय या दोन्ही शब्दांत 'द्र'वर पहिली वेलांटी असते. ('सेंद्रीय' असे लिहिणे चूक.)

---

सक्रिय

सक्रिय म्हणजे क्रियेसहित. 'स + क्रिय' अशी या शब्दाची फोड आहे. 'स' या अव्ययाचा अर्थ 'सहित' असा आहे. व्यक्तीच्या बाबतीत 'सक्रिय' हे विशेषण वापरले जाते, तेव्हा 'क्रियाशील' असा त्याचा अर्थ होतो. 'सक्रिय'मध्ये 'क्र'वर पहिली वेलांटी आहे. चुकून दुसरी वेलांटी दिली जाण्याची शक्यता असते. 'निष्क्रिय' हा 'सक्रिय'च्या विरुद्धार्थी शब्द आहे; मात्र 'संन्यासी' असाही त्याचा एक अर्थ आहे.

---

भाग ५
---------

देदीप्यमान

देदीप्यमान या विशेषणाचा अर्थ आहे तेजस्वी. अनेकदा हा शब्द दैदिप्यमान, दैदीप्यमान, देदिप्यमान अशा चुकीच्या रीतीने लिहिला जाण्याची शक्यता असते. या चुका टाळण्यासाठी या शब्दाच्या बाबतीत दोन गोष्टी लक्षात ठेवणे जरूरीचे आहे. यातील पहिले अक्षर दै नसून दे आहे आणि दुसरे अक्षर दि नसून दी आहे. (पहिल्या 'द'वर एकच मात्रा आणि दुसऱ्या 'द'वर दुसरी वेलांटी.)
---

अहल्या

अहल्या हे नाव पुराण काळापासून प्रसिद्ध आहे. गौतम ऋषींच्या पत्नीचे नाव अहल्या होते. अ + हल्या अशी याची फोड आहे. हल्य या शब्दाचा अर्थ आहे निंद्य. जी निंद्य नाही ती अहल्या. हल्य - हल = नांगर, अ हल्या - न नांगरलेली, अस्पर्श भूमी. (आदिम) हाही एक अर्थ आहे. या शब्दाऐवजी 'अहिल्या' असा चुकीचा शब्द अनेक जण वापरताना दिसतात. तो अपभ्रंश आहे. अहल्या हा शब्द वापरणे योग्य कसे, हे त्याच्या अर्थावरून स्पष्ट होते.

---

अस्थिपंजर

अस्थी म्हणजे हाड. पंजर म्हणजे सापळा. अस्थिपंजर या शब्दाची फोड अस्थि + पंजर अशी होते. हा मूळ शब्द संस्कृत आहे. म्हणून सामासिक शब्दात तो ऱ्हस्वान्तच लिहावा. अस्थीपंजर असे लिहू नये. अस्थिपंजरचा अर्थ हाडांचा सापळा.

---

माणुसकी

'माणूस' हे नाम आहे. या नामाला की हा प्रत्यय लावला असता 'माणुसकी' हे भाववाचक नाम तयार होते. माणूस या शब्दामध्ये जरी 'ण'ला दुसरा उकार असला तरी त्याचे भाववाचक नाम बनताना त्यात 'ण'ला पहिला उकार द्यायला विसरू नये. 'माणूसकी' असे लिहिणे चूक आहे.

---

क्षणभंगुर

'क्षणात नाश पावणारे' हा क्षणभंगुर या विशेषणाचा शब्दश: अर्थ आहे. क्षणिक, अशाश्वत या अर्थांनी हा शब्द रूढ आहे. भंगुर या विशेषणाचा अर्थ भंगणारे, ठिसूळ असा आहे. क्षणभंगुर या शब्दात 'ग'ला पहिला उकार, हे लक्षात असू द्यावे. (क्षणभंगूर असे लिहिणे चूक.) क्षणिक या विशेषणातही 'ण'वर पहिली वेलांटी, हेही लक्षात ठेवावे. (क्षणीक असे लिहिणे चूक.)

---

स्तुतिपाठक

'स्तुति' म्हणजे प्रशंसा, स्तोत्र. स्तुतिपाठक म्हणजे खुशामत करणारा. 'स्तुति' हा मूळ शब्द संस्कृत आहे. यात 'त'ला पहिली वेलांटी व 'स्त'ला पहिला उकार आहे. 'स्तुती' शब्द लिहिताना मात्र 'त' ला दुसरी वेलांटी द्यावी. कारण मराठीत अंत्य अक्षर दीर्घ असते.

---

भाग ६
---------

जाज्वल्य

एखाद्या गोष्टीचा अतिशय, तीव्र अभिमान असेल, तर आपण ‘जाज्वल्य’ अभिमान आहे, असं म्हणतो. हा शब्द अनेकदा ‘जाज्ज्वल्य’ असा चुकीचा लिहिला जातो. या शब्दात एकदाच ज आहे, हे लक्षात ठेवावे. ‘ज्वल्’ हा मूळ संस्कृत धातू असून, त्याचा अर्थ जळणे, पेटणे, दाह होणे असा आहे. एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी आपण त्याची मराठीत द्विरुक्ती करतो, तशी संस्कृतमध्येही केली जाते. पण संस्कृतची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे या शब्दात एकदाच ‘ज्व’ येतो.

---

महत्त्व

महत्त्व हा शब्द ‘महत्’ + ‘त्व’ असा तयार झाला आहे. महत् या संस्कृत शब्दाला ‘त्व’ हा प्रत्यय लागला आहे. मूळ ज्या शब्दाला प्रत्यय लागला आहे, त्यात शेवटी त् आहे. त्यातला त् आणि ‘त्व’मधला ‘त’ एकत्र येतात. पहिल्या ‘त्’चा लोप होतो आणि तेथे ‘त्त्व’ येतो. त्यामुळे महत्त्व या शब्दात दोनदा त आहे, हे लक्षात ठेवावे. ‘त्व’ हा प्रत्यय इतर अनेक शब्दांना लागतो. तेथे आधीच्या शब्दात शेवटी त् असेल, तर शेवटी त्त होते; अन्यथा होत नाही. उदा. व्यक्तिमत्त्व हा शब्द व्यक्तमत् + त्व असा असल्याने तो ‘व्यक्तिमत्त्व’ असा लिहिला जातो, ‘तत्त्व’ या शब्दातही + ‘त्व’ असल्याने तो ‘तत्त्व’ असा लिहिणे योग्य; तर अस्तित्व हा शब्द ‘अस्ति’ + त्व असा असल्याने ‘अस्तित्व’ असा लिहिला जातो. व्यक्तित्व या शब्दातही एकदाच ‘त’ येतो.

---

तज्ज्ञ

हा शब्द अनेकदा ‘तज्ञ’ असा चुकीचा लिहिला जातो. या शब्दात ‘ज्’ उच्चारणे आणि लिहिणे आवश्यक आहे. या शब्दाची फोड तद् + ज्ञ = तद् (ज् + ञ) (संस्कृतमध्ये ज्ञ = ज् + ञ) अशी आहे. द् या व्यंजनापुढे ज् हे व्यंजन आल्यास द्-बद्दल ज् होतो. (तद् + जन्य = तज्जन्य). म्हणून तद् + ज + ञ = तज् + ज् + ञ = तज् + ज्ञ = तज्ज्ञ. ‘तद्’ म्हणजे प्रसिद्ध, अनुभवलेले; तर ‘ज्ञ’ म्हणजे ज्ञानी, चतुर, विद्वान. एखाद्या विषयाच्या ज्ञानाचा भरपूर अनुभव असलेल्या व्यक्तीला आपण त्या विषयातील ’तज्ज्ञ’ म्हणतो. मात्र, एखाद्या शब्दाच्या शेवटी ’त’ असल्यास पुढे केवळ ‘ज्ञ’ प्रत्यय लावण्याची पद्धत आहे. उदा. भाषातज्ज्ञ, पण गणितज्ञ किंवा व्याकरणतज्ज्ञ, पण संगीतज्ञ. दोन्हीचा अर्थ एकच!

---

पारंपरिक

पारंपरिक हा शब्द ‘पारंपारिक’ असा लिहिण्याची चूक कायम अनेकांकडून घडते. मात्र, हा शब्द ‘पारंपरिक’ असा लिहिणे योग्य आहे. परंपरा या शब्दाला ‘इक’ प्रत्यय लागल्यावर पहिल्या अक्षरातील स्वराची वृद्धी होते. बाकी इतर अक्षरांत फरक होत नाही. त्यामुळे ‘पारंपरिक’ हेच रूप योग्य ठरते. अन्य उदाहरणे - समाज : सामाजिक, समुदाय - सामुदायिक, शरीर - शारीरिक इ.
---

जन्मशताब्दी

अब्द या संस्कृत शब्दाचा अर्थ वर्ष असा आहे. शत + अब्द यांचा संधी होऊन शताब्द (शंभर वर्षे) हा संस्कृत शब्द तयार होतो. पंचम - पंचमी याप्रमाणे शताब्द या शब्दाचे शताब्दी हे स्त्रीलिंगी रूप होते. जन्मशताब्दी याचा अर्थ ‘जन्मास शंभर वर्षे झाली’ असा होतो. या शब्दातच ‘अब्द’ म्हणजेच वर्ष हा शब्द असल्याने ‘जन्मशताब्दी वर्ष’ असे लिहिणे चूक. ‘पिवळे पितांबर’सारखीच ही द्विरुक्ती होय. ‘सुधीर फडके यांचे हे जन्मशताब्दी वर्ष’ ही वाक्यरचना चुकीची असून, ‘सुधीर फडके यांची ही जन्मशताब्दी’ हे योग्य होय.

----

(स्रोत : मराठीतील विविध व्याकरणविषयक पुस्तके)

#मराठी_व्याकरण
---

20 Jul 2019

बाकीबाब आणि मी - रसग्रहण

सुखानेही असा जीव कासावीस
-----------------------------



बा. भ. बोरकर म्हणजे कोकणी व मराठीतले एक महत्त्वाचे कवी. बोरकरांच्या कविता नादमय, गेय आणि रसरशीत असतात. त्या वाचताना वाचकाला जगण्यावर भरभरून प्रेम करावंसं वाटतं. बोरकरांना शब्द प्रसन्न होते. त्यांची शब्दकळा सुरेख आणि सुरेल होती. स्वत:ला ‘पोएट बोरकर’ म्हणवून घेणारे हे देखणे, रसिले व्यक्तिमत्त्व १९८४ मध्ये काळाच्या पडद्याआड गेले. तेव्हा मी फारच लहान, म्हणजे केवळ ८-९ वर्षांचा होतो. त्यांच्या निधनाची बातमी पेपरमध्ये वाचल्याचं मला आठवतंय. पण बाकी या व्यक्तिमत्त्वाचा खरा परिचय व्हायचा होता. तो खूप नंतर झाला. पु. ल. आणि सुनीताबाईंनी बोरकरांच्या कवितेचा जो कार्यक्रम केला होता, त्याची ऑडिओ क्लिप मी मोबाइलवर ऐकली आणि त्या वेळी खऱ्या अर्थानं या कवीची नीट ओळख झाली, असं म्हणता येईल. 
त्याआधी सलील कुलकर्णीच्या ‘संधीप्रकाशात’ व नंतर ‘क्षण अमृताचे’ या अल्बममध्ये बोरकरांच्या कविता गाणी म्हणून समोर आल्या आणि बोरकर तर आवडू लागलेच; पण सलीलच्या चाली आणि त्यानं केलेली गाणीही खूप भावली. कवितेवर मन:पूत प्रेम करणारा माणूसच अशी गाणी देऊ शकतो. सलील केवळ संगीतकार नाही, तर मुळात तो आधी एक चांगला वाचक, आस्वादक आहे. कवितांचा तर त्याचा व्यासंगच आहे. त्याला अनेक कवींच्या अक्षरश: शेकडो रचना मुखोद्गत आहेत. शब्दांवर विलक्षण प्रेम असल्याशिवाय हे घडू शकत नाही. सलीलची आणि माझी ओळख वीस वर्षांहून अधिक काळ आहे. आता चांगली मैत्रीच आहे. त्याचं कवितेवरचं, शब्दांवरचं प्रेम अतिशय आनंददायक आहे. त्यात मंचीय कार्यक्रम रंगवण्यात सलीलचा हातखंडा आहे. सलीलमध्ये एक खोडकर, मिश्कील मूल दडलंय असं मला नेहमी जाणवतं. त्याच्या डोळ्यांतून ते अनेकदा दिसतं. बोरकरांच्या कवितांना सलीलने लावलेल्या चाली ऐकल्यावर खास बोरकरांवर सलीलनं कार्यक्रम करावा, असं फार वाटायचं. मी त्याला हे बोलूनही दाखवलं होतं. आपण एखादी इच्छा धरावी आणि ती तत्काळ फलद्रूप व्हावी, असं फार क्वचित घडतं. पण बोरकरांच्या कविता आवडणाऱ्या सगळ्या चाहत्यांचं एकत्रित पुण्य फळाला आलं असावं. कारण १९ जुलैला ‘बाकीबाब आणि मी’ असा कार्यक्रम करीत असल्याचं सलीलनं या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केलं आणि मला तर अचानक लॉटरी लागल्यासारखा आनंद झाला.
‘देखणी ती पाऊले’ या बोरकरांच्या प्रसिद्ध कवितेच्या वाचनाने कार्यक्रम सुरू झाला. आमचे अण्णा - किरण यज्ञोपवित - यांनी त्यांच्या खर्जातील आवाजात ही कविता सादर केली आणि मैफलीची सुंदर नांदीच झाली. त्यानंतर बोरकरांची आणि आपली पहिली भेट कशी झाली, याचा किस्सा सलीलनं सांगितला आणि त्यांची ‘कशी तुज समजावू’ ही अत्यंत गोड रचनाही ऐकविली. नंतर ‘डाळिंबीच्या डहाळीशी नको वाऱ्यासवे झुलू’ या आनंद मोडकांनी संगीतबद्ध केलेल्या आणि मुकुंद फणसळकर व श्रीकांत पारगावकरांनी गायिलेल्या गाण्याचा (मूळ निर्मिती चंद्रकांत काळे व ‘शब्दवेध’) उल्लेख झाला. ‘नको घुसळू पाण्यात खडीसाखरेचे पाय’ या ओळी तर खल्लासच! नंतर मग सलीलनं पहिल्यांदा बोरकरांची जी कविता स्वरबद्ध केली, त्या ‘तव नयनांचे दल हलले गं’ या अत्यंत गाजलेल्या कवितेची आठवण निघाली. सलीलनं त्याच्या नेहमीच्या ढंगदार शैलीत हे गाणं सादर केलं आणि मैफलीला रंग चढू लागला. 
बोरकरांच्या मधुराभक्तीच्या कवितांचा खास उल्लेख झाला. त्यात सलीलची (आणि माझीही) अत्यंत आवडती अशी ‘माझ्या कानी बाई बाई वाजे अलगूज’ ही कविता आली. ‘सुखानेही असा जीव कासावीस’ ही ओळ याच कवितेतील. ही मैफल जसजशी रंगत गेली तशी रसिकांची अवस्था जवळपास अशीच झाली.
या कार्यक्रमात नेहमीच्या लोकप्रिय रचनांसोबत सलीलनं काही नव्या रचनाही ऐकवल्या. तिकीट काढून येणाऱ्या रसिकांना आपण काही तरी नवंही दिलं पाहिजे, अशा रास्त आग्रहास्तव सलीलनं या तीन रचना अगदी नुकत्याच कंपोझ केल्या. ‘अशी मारशील कुणाला गं’ आणि ‘हरिणी’ या दोन रचनांना आणि वाद्यवृंदाला खास दाद मिळाली. पण मला सगळ्यांत अधिक आवडली ती सलीलनं म्हणून दाखवलेली ‘खेड्यातच त्याची सारी हयात केली’ ही अप्रतिम कविता. कॉलेजच्या काळात पाठ असलेली कविता सलीलनं एवढ्या वर्षांनंतरही जशीच्या तशी म्हणून दाखविली. ही कविता मी पूर्वी वाचली नव्हती किंवा ऐकली नव्हती. नेहमीच्या कविताही सलीलनं त्याच्या खास शैलीत ऐकविल्या. श्रोत्यांशी संवाद साधत, हास्यविनोद करीत मैफल रंगवण्याचं एक तंत्र आहे. सलील त्यात वाकबगार आहे. या वेळी जोडीला किरणच्या खर्जातल्या आवाजात बोरकरांच्या ‘इंटेन्स’ कविता ऐकणं हा एक अनुभव होता. ‘दिसली नसतीस तर...’ ही सुनीताबाईंनी अजरामर केलेली कविता त्यांचा प्रभाव पुसून सादर करणं कठीण काम. पण किरणनं ते केलं. सई टेंभेकर आणि मेघना सरदार या दोघींनीही काही रचना अतिशय समजून गायल्या. आदित्य आठल्ये, डॉ. राजेंद्र दूरकर व रितेश ओहळ या तिघांनीही अत्यंत नेमकी साथसंगत केली. दूरकर तर किती विविध प्रकारची वाद्यं वाजवतात! रितेश यांची गिटारही जबरदस्त!

या कार्यक्रमाचं नेपथ्य उत्तम होतं. दोन्ही बाजूंनी बोरकरांच्या कविता लिहिलेले फलक उभारण्यात आले होते. मागे डिजिटल पडदा होता आणि त्यावर कवितेनुसार प्रतिमा उमटत होत्या. म्हणजे ‘सरीवर सरी आल्या गं’ हे गाणं चालू असताना मागे पावसाच्या सरी व टपोरे थेंब पडताना दिसत होते. वास्तविक हा प्रकार गाण्याच्या आस्वादात अडथळा आणणारा ठरू शकला असता. पण त्या स्क्रीनवरील रंगांचा वापर आणि प्रकाशयोजना एवढी उत्तम होती, की या नेपथ्याने मूळ गाण्यांच्या आस्वादाला अडथळा न आणता, मखराची भूमिका बजावली. एकूण नक्षी सगळीच जमून आली. 
अशा कार्यक्रमाला प्रेक्षकही सुजाण लागतो. सलीलच्या प्रेमापोटी तिथे जमलेले बहुतेक सगळेच खऱ्या अर्थानं रसिक होते. चांगलं वाचणारे, चांगली दाद देणारे होते. त्यामुळं हा केवळ मंचीय आविष्कार न राहता, त्याला मैफलीचं स्वरूप आलं. सलीलनंही निवेदनात हे बोलून दाखवलं. 
खरं तर अशा प्रकारच्या मैफली वारंवार व्हाव्यात. बोरकरांसारखे आनंददायक कवी सर्व मराठी जनांपर्यंत पोचावेत. सलील हे काम करू शकतो. तसं झाल्यास मराठी भाषेची ती फार मोठी सेवा ठरेल. तूर्त बोरकरांच्या सुरेख शब्दकळा आठवत आनंद लुटत राहायचं. 
बोरकरांची मला अतिशय आवडणारी कविता शेवटी शेअर करावीशी वाटते. 

बोरकर लिहितात -

स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा
तृप्ति नको मज मुक्‍ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा
शोक हवा परि वाल्मिकिच्या परि सद्रव अन् सश्लोक हवा
हर्ष हवा परि स्पर्शमण्यापरि त्यांत नवा आलोक हवा
शंतनुचा मज मोह हवा अन ययातिचा मज देह हवा
पार्थाचा परि स्नेहविकंपित स्वार्थ सदा संदेह हवा
इंद्राचा मज भोग हवा अन चंद्राचा हृद्रोग हवा
योग असो रतिभोग असो अतिजागृत त्यात प्रयोग हवा
आयु हवे आरोग्य हवे यशभाग्य तसा प्रासाद हवा
श्लाघ्य हवे वैराग्य तयास्तव त्यांत विरोध विषाद हवा
तापासह अनुताप हवा मज पापासह अभिशाप हवा
शिळांत पिचतां जळांतुनी मज निळा निळा उःशाप हवा
मार्क्साचा मज अर्थ हवा अन् फ्रॉइडाचा मज काम हवा
या असुरां परि राबविण्या घरिं गांधींचा मज राम हवा
लोभ हवा मज गाधिजमुनिचा अखंड आंतर क्षोभ हवा
पराभवांतहि अदम्य उज्ज्वल प्रतिभेचा प्रक्षोभ हवा
पार्थिव्यांतच वास हवा परि दिव्याचा हव्यास हवा
शास्त्रांचा अभ्यास हवा परि मानव्याचा ध्यास हवा
विश्व हवे सर्वस्व हवे अन् मृत्यू समोर सयंत्र हवा
शरांत परि ही विव्हळतां तनु उरांत अमृतमंत्र हवा
हविभुक सुरमुख मी वैश्वानर नित्य नवा मज ग्रास हवा
हे सुख दुर्लभ वाढविण्या मज चौर्‍यांशीत प्रवास हवा

----


29 Jun 2019

जगणं मस्त मजेचं... जून २०१९

जगणं मस्त मजेचं...
---------------------


रसिकहो नमस्कार,
‘जगणं मस्त मजेचं’ ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दर शनिवारी सकाळी पावणेनऊ वाजता (आणि दुसऱ्या दिवशी, रविवारी सकाळी सव्वानऊ वाजता ‘विविधभारती’वर) प्रसारित होणारी लोकप्रिय कौटुंबिक श्रुतिका मालिका..! या मालिकेसाठी लिखाण करण्याची संधी मला गौरी लागू आणि आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक गोपाळ औटी यांनी दिली. मी यानिमित्ताने श्रुतिका प्रथमच लिहिली. पुण्यात राहणाऱ्या, कुणाल व रेणू या आधुनिक, आजच्या काळात जगणाऱ्या दांपत्याच्या आयुष्यावर ही काल्पनिक श्रुतिका लिहायची होती. हे काम मला आवडलं... कुणाल इंजिनीअर, तर रेणू मराठीची प्राध्यापिका असते...
मी या मालिकेसाठी गेल्या वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर हे दोन महिने लेखन केलं. आता या वर्षी मे व जून हे दोन महिने मी या मालिकेसाठी स्क्रिप्ट लिहीत आहे. या मालिकेसाठी मे महिन्यासाठी लिहिलेले स्क्रिप्ट आधीच ब्लॉगवर शेअर केले आहेत. आता जून महिन्यासाठी लिहिलेले पाच भाग इथं शेअर करतो आहे. अर्थात या स्क्रिप्टचं वाचन करणारे अमित वझे (कुणाल), रूपाली भावे-वैद्य (रेणू), आरती पाठक (सई), दीप्ती भोगले (दिघेकाकू), गोंधळेकरकाका (बाळाजी देशपांडे), देशमुख सर (संजय डोळे), पूर्वा बाम (सायली), प्रतुल पवार (प्रकाश), प्रांजली बर्वे (वर्षा) यांच्यामुळं ही श्रुतिका खऱ्या अर्थानं श्रवणीय झाली. नुकताच १२ मे रोजी या श्रुतिकेचा पन्नासावा भाग ‘आकाशवाणी’त रेकॉर्ड झाला आणि तेव्हा रेकॉर्डिंगला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. 
आकाशवाणीसाठी लिहावं ही माझी खूप जुनी इच्छा होती. गेल्या दोन-तीन वर्षांत तशा काही संधी मिळाल्या, तरी श्रुतिका हा प्रकार लिहायला मिळेल, असं वाटलं नव्हतं. ‘जगणं मस्त मजेचं’ या मालिकेच्या निमित्तानं माझी ही इच्छाही पूर्ण झाली, याचा मनापासून आनंद आहे. 

(* हे स्क्रिप्ट आणि प्रत्यक्षात सादर झालेले भाग यात थोडेफार बदल आहेत. कधी कलाकारांनी इम्प्रोव्हायझेशन केलं आहे, तर कधी काही भाग एडिट झाला आहे. पण एकूण इफेक्ट अर्थातच खूप चांगला आला आहे.)

-----

जगणं मस्त मजेचं... १ जून २०१९
-------------------------------

कुणाल (गुणगुणतोय) - बार बार दिन ये आए, बार बार हम ये गाए, तुम जियो हजारो साल, ये मेरी है आरजू... हॅपी बर्थ डे टु यू... हॅपी बर्थ डे टु यू... हॅपी बर्थ डे टु यू सुनीता, हॅपी बर्थ डे टु यू....
रेणू (हसते) - आता ही कोण सुनीता नवीन काढलीयेस बाबा?
कुणाल - अगं कुणी नाही गं... ती सिनेमातलीच. पण आज सकाळपासून वेगवेगळ्या ग्रुपवर एवढे बर्थ डे विशेसचे मेसेजेस पडताहेत ना, की बस्स! आणि त्यात हे गाणं... 
रेणू - अरे, आजच्या दिवसाचा महिमाच आहे तसा... आज एक जून! हा आपल्याकडचा राष्ट्रीय वाढ-दिवस म्हणायला हवा. कित्येक लोकांचे वाढदिवस असतात आज...
कुणाल - हो. पूर्वी लोकांना जन्मतारीख माहितीच नसायची. मग शाळेत दाखल करताना बहुतेकांच्या जन्मतारखा एक जून, १५ जून अशा नोंदविल्या जायच्या. खूप लोकांचे वाढदिवस त्यामुळं या दिवशी असतात. ते खरे असताच असं नाही.
रेणू - माहितीय अरे! म्हणूनच मी राष्ट्रीय वाढ-दिवस असं म्हटलं. आमच्या कॉलेजमध्ये अजूनही किती तरी मुलांचे वाढदिवस याच दिवशी असतात. 
कुणाल - म्हणजे अजूनही कित्येक मुलांना त्यांचे वाढदिवस माहिती नसतात? विश्वास बसत नाही बरं का...
रेणू - अरे, ग्रामीण भागात अजून फार परिस्थिती बदलली नाहीय बाबा... विश्वास बसणार नाहीच तुझा...
कुणाल - बरं, ते जाऊ दे. मला आज ब्लॅक फॉरेस्टचाच केक हवा.
रेणू - आँ? आज काय मधेच कुणालमहाराज? केक कशामुळं खावासा वाटतोय तुम्हाला?
कुणाल - अगं का म्हणून काय विचारतेयस रेणू... हा राष्ट्रीय वाढ-दिवस आहे ना, मग आपण नको का तो साजरा करायला?
रेणू - कर बाबा कर... तुमचा पगारही झाला असेल आज... आमच्या कॉलेजला तशी घाई नसते. निवांत होतो कधी तरी पाच, सहा तारखेला...
कुणाल - अहो मॅडम, पण आम्ही तेवढं राबतो पण बरं का!
रेणू - वा रे वा... आणि आम्ही बायका काय ऑफिसात मंगळागौरीचे खेळ खेळायला जातो काय रे? वा?
कुणाल - पण काहीही म्हण हं रेणू... आमची कंपनीच चांगली आहे तुमच्या कॉलेजपेक्षा...
रेणू - राहू द्या, राहू द्या... हा वाद काही संपायचा नाही. आणि तू ब्रेकफास्टचं काय ठरवलंयस? काही करणार आहेस घरी, की मागवणार आहेस बाहेरून? कारण मला दिघेकाकूंकडं जायचं आहे. साराचं पाळणाघर सुरू होईल ना परवापासून... त्याबद्दल जरा बोलायचंय...
कुणाल - मी एक काम करतो. मी इडली-मेदूवडा सांबार पार्सल घेऊन येतो आणि आपण दोघंही दिघेकाकूंकडं जाऊ. मीही बरेच दिवसांत गेलेलो नाहीय त्यांच्याकडं. त्यांनाही सांग.
रेणू - अरे, मग त्यांचंही पार्सल घेऊन चल ना. 
कुणाल - तेच सांगतोय रेणू. तिकडंच जाऊ...
रेणू - ओके, चल...

(दिघेकाकूंचं दार वाजवतात...)

रेणू - काकू, आहात का घरात?
दिघेकाकू - अगं रेणू, ये ये. तुझीच वाट बघत होते. काल फोन केला होतास ना... कुणाल पण आलाय का? ये ये... बसा रे दोघं... पाणी आणते.
कुणाल - काकू, राहू द्या. आणि आम्ही इडली-सांबार मागवलंय. येईल तो माणूस इतक्यात... आज ब्रेकफास्ट आमच्यातर्फे...
दिघेकाकू - अरे, मला मेलीला कशाला रे ब्रेकफास्ट आणि हे सगळं? मी दोन वेळ जेवते बघ. त्यातही रात्री तर फार कमी. शक्यतो फलाहार...
कुणाल - अहो काकू, तुमचा डाएट प्लॅन काय आहे ते तरी सांगा. मला पण फॉलो करायचा आहे हो. माझं वजन बघा, दिवसेंदिवस वाढतच चाललंय.
रेणू - काकू, छान आहे हे... कमीत कमी जेवण... आणि भुकेवर नियंत्रण... 
दिघेकाकू - अगं, आता माझं वय झालं. अन्नाची, ऊर्जेची गरज आहे ती तुम्हा तरुण लोकांना. तुम्ही व्यवस्थितच खाल्लं पाहिजे. 
कुणाल - काकू, ते सगळं बरोबर आहे. पण अहो, जिभेवर ताबाच राहत नाही अनेकदा. हे खाऊ की ते खाऊ असं होतं. मग मी दोन्ही खातो. (हसतो)
रेणू - आणि व्यायामालाही दांडी मारतो. 
कुणाल - रेणू, आत्ता इथं या दुखऱ्या जखमेवर डागण्या देण्याची खरंच गरज आहे का?
रेणू - हे बघ, तुझी तब्येत चांगली ठेवणं हे तुझ्याच हातात आहे. मी ओरडून काही उपयोग आहे का?
दिघेकाकू - अगं, त्याचं त्याला समजत असेल की... हे बघ कुणाल, आपल्या शरीराला बरोबर समजतं, की आपल्याला काय हवंय आणि काय नकोय! आपल्यासाठी काय चांगलंय आणि काय नाही... तेव्हा आपण आपल्या शरीराचं ऐकायचं. शरीर आपल्याला वेळोवेळी सिग्नल देत असतं. पण आपण त्याकडं दुर्लक्ष करतो.
कुणाल - बरोबर आहे काकू तुमचं...
रेणू - काकू, अगदी हेच मी सांगत असते याला. आपलं शरीर होता होईल तोवर आपल्याला साथ देत असतं. तुम्ही त्याच्याकडं दुर्लक्ष केलंत तरी ते बिचारं त्याची कामं करीत राहतं. पण मग कधी तरी कुरकुर करतं. मग आपलं डोकं दुखायला लागतं, पोट बिघडतं... आजारी पडायला होतं.
कुणाल - आणि हीच ती वेळ असते. आपण आपल्या शरीराचे सिग्नल ऐकण्याची!
रेणू - अरे, खरंच फार वेळ द्यावा लागत नाही. रोज किमान अर्धा ते पाऊण तास द्यायला काय हरकत आहे स्वतःच्या शरीरासाठी...
दिघेकाकू - मधे चालायला जात होतास ना रे? हल्ली दिसत नाहीस खाली....
कुणाल - अहो काकू, तेच ना! खंड पडलाय. पण आता पुन्हा सुरू करायला हवं. जिम पण लावली आहे. पण अनेकदा बुडतेच.
रेणू - कुणाल, याला काहीही अर्थ नाहीय. आपण शरीराचं ऐकलं नाही ना, की मग ते आपल्याला साथ देत नाही. मग त्याचे परिणाम फार वाईट असतात. 
दिघेकाकू - खरंय रेणू तुझं... आमच्या वेळी बायकांना एवढे शारीरिक कष्ट होते की, काही विचारू नकोस. मी तर जात्यावर दळण केलेलं आहे. दळण, कांडण, पाणी भरणं, २५ माणसांचा साग्रसंगीत स्वयंपाक करणं... आमच्या कमरेचा काटा अक्षरशः ढिला होऊन जायचा. पण तेव्हा पर्यायच नव्हता. काही सोयी नव्हत्याच गं...
रेणू - आणि आता अति सोयी आहेत, त्याचेही दुष्परिणाम आम्हालाच भोगावे लागताहेत. आता शरीराला काही हालचालच नाही.
कुणाल - ए रेणू, मला कडाडून भूक लागलीय आणि मी ते पार्सल अजून का आलं नाही, ते बघून येतो. आता मला काहीही बोलण्याची ताकद उरलेली नाही.
रेणू - जा, जा. तोवर मी काकूंशी गप्पा मारते.
दिघेकाकू - अरे, राहू दे. कुठं जातोस? थांब. येईल तो माणूस... तोवर तुला मी माझ्या घरातले पौष्टिक लाडू देते थांब. मुलांसाठी मी करूनच ठेवलेले असतात.
कुणाल - व्वा व्वा... काकू, कसं बोललात? द्या लाडू... आता काही मी इथून हलत नाही.
रेणू - छान. हे याचं असं आहे.
दिघेकाकू - असू दे गं. सध्या नाही तरी मुलं नाहीतच. ते लाडू पडूनच आहेत. कोण खाणार?
रेणू - काकू, सध्या मुलांच्या सुट्टीमुळं तुम्हाला सुनं सुनं वाटत असेल नाही?
दिघेकाकू - अगं, हो... एवढी सवय झालीय ना चिवचिवाटाची. पण सध्या कुणीच नाही. आता सोमवारपासून येतील माझी पाखरं सगळी परत घरट्यात.
कुणाल - व्वा... खरंच... ही तुमची पाखरंच आहेत सगळी. या मुलांच्या सहवासात तुमचं मन फार आनंदी राहत असेल नाही का काकू?
रेणू - अरे, पण एवढ्या मुलांचं करायचं, त्यांना हवं-नको ते पाहायचं हे तसं त्रासाचंच काम आहे रे कुणाल...
दिघेकाकू - खरं सांगू का, तुम्हाला मुळात त्या कामाची आवड पाहिजे बघ. मग काही वाटत नाही. आता मला मुलांची आवड आहे. मी आपलं-परकं असं काही मानतच नाही. ही सगळी माझीच नातवंडं आहेत, असं समजून वागते. अगदी त्यांची शी काढण्यापासून ते कित्येकांना घास भरवण्यापर्यंत सगळं करते. माझा म्हातारीचा वेळही बरा जातो आणि चार पैसे मिळतात ते महत्त्वाचं.
कुणाल - काकू, ते जरी खरं असलं, तरी तुमचा उत्साह सगळ्यांकडं असतोच असं नाही. आता किती वर्षं झाली तुम्ही हे पाळणाघर चालवता आहात?
दिघेकाकू - अरे, आता पंधरा वर्षं होऊन गेली बघ. सुरुवातीला जरा जड गेलं मला. नाही असं नाही. पण आता अगदी सवयच झालीय. आमच्या वेळी अशी पाळणाघरं असती ना, तर मी पण या रेणूसारखी नोकरी केली असती बघ.
रेणू - काकू, खरंच. तुम्ही शिकलेल्या आहात. पदवीधर आहात. त्या काळात तुम्हाला सहज नोकरी मिळाली असती, नाही का?
दिघेकाकू - अगं हो, पण तेव्हा फार पद्धत नव्हतीच गं बायकांनी नोकरी करायची. हे गेल्या वीस-तीस वर्षांत जास्त वाढलं. पण मला स्वतःला आवडलं असतं नोकरी करायला. शिक्षणाचा उपयोग झाला असता.
कुणाल - नक्कीच झाला असता. आपल्याकडं तर अजूनही कित्येक मुली शिकतात खूप, पण नोकरी करतील किंवा काही तरी करिअर करतील असं होत नाही. विशेषतः लग्न झालं, की संपलंच. मोठी शहरं सोडली, तर अजूनही हेच चित्र बघायला मिळतं काकू सगळीकडं.
दिघेकाकू - खरंय बाबा. त्या मानानं रेणू नशीबवानच म्हणायला हवी.
रेणू - काकू, माझ्या बाबतीत काही प्रश्नच नव्हता. अहो, माझी आईसुद्धा नोकरी करत होती. त्यामुळं तिची मुलगी घरात बसून राहील, हे शक्यच नव्हतं.
कुणाल - आणि मलाही नोकरी करणारीच बायको हवी होती. घरात बसणारी नको होती. पण काकू, तुमचं हे पाळणाघर आहे म्हणून आम्ही दोघंही बाहेर नोकरीला जाऊ शकतो, हे मात्र शंभर टक्के खरं.
दिघेकाकू - अरे, माझं नसतं तर अजून कुणाचं तरी असतं. हल्ली आता काय आहे, ही एक प्रकारे काळाची गरज झाल्यासारखीच आहे. अनेक घरांत नवरा-बायको आणि त्यांचं एकुलतं एक मूल... एवढेच! आजी-आजोबासुद्धा नसतात सोबत. मला या मुलांची खरं तर दया येते. ही मुलं मोठी होऊन भावनाशून्य तर होणार नाहीत ना, अशी भीती वाटते. ती एवढी स्वतःमध्येच रमलेली असतात, की थक्क होते मी ते बघून...
रेणू - काकू, तुम्ही म्हणता, त्या मुद्द्यामध्ये नक्कीच तथ्य आहे. हल्ली मानसशास्त्राच्या अंगानंही याचा खूप विचार होतोय. म्हणून आम्ही साराला भरपूर मित्र-मैत्रिणी असतील यावर लक्ष देतो. मागच्याच आठवड्यात ती मैत्रिणीकडं नाइट आउटला गेली होती. शिवाय आत्ये-मामे भावंडांमध्येही ती रमते. आम्ही आमच्या सगळ्या नातेवाइकांकडं जातो आणि त्यांनाही कायम आमच्या घरी बोलावतो. शिवाय आमचे मित्र-मैत्रिणीही आहेत आणि त्यांची सगळ्यांची मुलंही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. 
दिघेकाकू - व्वा... अगं, असं असेल तर किती छान आहे हे! पण सगळेच पालक तुझ्यासारखे जागरूक नसतात आणि एवढा विचारही करत नाहीत.
कुणाल - हल्ली तर मुलांच्या हातात मोबाइल देऊन पालक स्वतःची सुटका करून घेतात. हे तर भयंकर आहे.
दिघेकाकू - अगदी. त्यामुळं आमच्या इथं मुलांकडं मोबाइल तर सोडच, पण बाकी कसलंही इलेक्ट्रॉनिक, ते काय तुम्ही म्हणता त्याला, ते काहीही द्यायला मी पूर्ण बंदी केलीय आहे.  
रेणू - गॅजेट...
दिघेकाकू - हां, तेच तेच... मी ते मुलांना इथं अजिबात खेळू देत नाही. इथं मुलं बैठे खेळ खेळतात. 
कुणाल - हे बाकी फार चांगलं करता काकू तुम्ही. आम्ही सगळ्यांना सांगतो नेहमी तुमच्या पाळणाघरातच आम्ही साराला का ठेवतो ते...
रेणू - मुलांना लहान वयात एवढा उत्साह असतो, एवढं काय काय करावंसं वाटत असतं, एवढं बागडावंसं वाटत असतं... पण आपण त्यांना हाताता मोबाइल देऊन एका जागी स्थानबद्ध करून टाकतो अगदी.
कुणाल - भयंकर किस्से ऐकतोय मी सध्या याबाबत. आमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये तर नेहमीच चर्चा चालते यावर... म्हणजे हे कसं चुकीचं आहे यावर सगळ्यांचं एकमत आहे. पण याला पर्याय काय हे फार कमी लोक सुचवतात.
दिघेकाकू - आपल्याकडं हेच फार आहे. चर्चा खूप. प्रत्यक्ष कृती कमी... सगळ्यांच बाबतीत हे दिसतं.
रेणू - काकू, तुमचं मात्र तसं नाही. तुम्ही तुमच्या मतांवर ठाम असता. आणि तसं सगळ्यांना वागायला सांगता, हे महत्त्वाचं.
कुणाल - खरंय रेणू. काकू, बाकी लाडू फार मस्त झाला होता हं... अगदी घरच्यासारखा...
दिघेकाकू - अरे, म्हणजे काय? मी घरीच केलेयत ते लाडू... तुला एवढे आवडलेयत तर डब्यात घालून देते आणखी चार लाडू. रोज खा घरी...
रेणू - झालं. आता कुणाल मला पाळणाघरातच ठेवून घ्या, असं नाही म्हटला म्हणजे मिळविली.
दिघेकाकू (हसतात) - अगं, काय गं हे? किती चेष्टा करतेस त्याची...
कुणाल - बघा तुम्हीच काकू. बाकी मला तुमच्याकडून एक गोष्ट नीटच समजली आहे आणि ती मी नक्की फॉलो करीन.
दिघेकाकू - कोणती रे बाबा?
कुणाल - अहो, मॅनेजमेंट! तुमचं व्यवस्थापनाचं कौशल्य घेण्यासारखं आहे. स्वतःच्या आहार-विहाराचं आणि त्याचबरोबर या पाळणाघराचं व्यवस्थापन तुम्ही किती उत्तम पद्धतीनं केलेलं आहे. व्वा व्वा...
दिघेकाकू - मला कसलं डोंबलं येतंय रे मॅनेजमेंट? काही नाही. मी आपलं मला जे सुचेल ते करते.
रेणू - काकू, यालाच आम्ही वयानं आलेलं समजूतदार शहाणपण असं म्हणतो. कितीही शिकलेला माणूस असला, तरी त्याच्याकडे हे असेलच असं नाही. त्याच्याकडं थिअरीज असतील, मोठमोठे सिद्धान्त असतील, पण जगणं सोपं करणाऱ्या चार साध्या युक्त्या असतीलच असं नाही. त्या सापडतात तुमच्यासारख्या साध्या, पण हुशार गृहिणींकडेच...
दिघेकाकू - बाई, बाई... पुरे झालं हं मेलं ते कौतुक... आधी तुमचा तो ब्रेकफास्टवाला कधी येतो ते बघा बरं. आता मलाही भूक लागलीय खरी.

(दार वाजल्याचा आवाज येतो.)

कुणाल - हे बघा. आलाच ब्रेकफास्ट... चला आता गप्पा कमी... आधी खाऊन घेऊ... मग पुन्हा पोटभर गप्पा मारू...
दिघेकाकू - अजून पोट भरलं नाही का रे तुझं?
कुणाल - तसं नाही. पण तो एक पौष्टिक लाडू जरा मिळाला असता अजून एक तर....
रेणू - कुणाल ऽऽऽऽ

(सगळे हसतात.)

---

जगणं मस्त मजेचं... ८ जून २०१९
-------------------------------------

रेणू (गुणगुणते) - पाऊस पहिला जणू कान्हुला, बरसून गेला, बरसून गेला... पाऊस पहिला...
कुणाल - व्वा रेणू व्वा... छान गातेयस... किती दिवसांनी हे गाणं ऐकलं... पूर्वी रेडिओवर लागायचं... 
रेणू - अरे, अजूनही लागतं. मला आवडतं. हे गाणं म्हटलं ना, तरी मला पाऊस आल्याचा फील येतो. आतल्या आत गार वाटायला लागतं.
कुणाल - खरंय. पावसाचा नुसता वास आला, तरी पावसाची गाणी, कविता आठवतात. अगदी राज कपूरच्या 'बरसात में हम से मिले तुम सजन तुम से मिले हम... बरसात में'पासून ते आमीरच्या 'टिप टिप टिप टिप बारीश शुरू हो गई'पासून सगळी पाऊस गाणी आठवतात.
रेणू - मला 'पाऊस कधीचा पडतो' किंवा 'ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता' ही ग्रेसची गाणी आठवतात. शहाराच येतो अंगावर...
कुणाल - निसर्गाची पण काय कमाल असते ना रेणू खरंच. कसं कळतं त्याला की, जून उजाडलाय. वातावरण लगेच बदलतं. हवेत गारवा येतो. 'गारवा'वरून आठवलं, आम्ही कॉलेजला असताना ती 'गारवा'ची गाणी काय गाजली होती... गारवा... (गुणगुणतो) अहाहा...
रेणू - बास, बास, बास... आता पावसाच्या कवितांची आणि गाण्यांचा विषय काढलास तर पुढची कामं अवघड होऊन जातील. आपण दिवसभर इथंच गप्पा मारत बसू शकतो या विषयावर...
कुणाल - क्या बात है रेणू... रोमँटिक मूड? आँ? 
रेणू - हा पाऊस मूड आहे. छान असतो तो... मला ना तुझ्यासारखं असं ट्वेंटीफोर बाय सेव्हन रोमँटिक मूडमध्ये नाही राहता येत रे... बघ. मला ब्रेकफास्टची आठवण झाली. काय करतोयस बोल...
कुणाल - किती अरसिक आहे गं तू रेणू... इथं मी एवढी प्रेमाची ओलीचिंब गाणी म्हणतोय आणि तू ब्रेकफास्टचं काय काढतेस? छ्या! 
रेणू - तो ओलाचिंब टॉवेल पडलाय ना केव्हापासून सोफ्यावर... तो उचलून आधी वाळत घाल. आणि सांग ना, ब्रेकफास्टचं काय करतोयस ते...
कुणाल - मी भजी करू का? आपोआप पाऊस पडल्याचा फील येईल.
रेणू - कर. जे काही करायचं ते लवकर कर. मला कॉलेजात जायचंय. मीटिंग आहे.
कुणाल - अरे हो, तुमचं रुटीन सुरू झालं नाही का? मला मात्र अजूनही ती मे महिन्याची सुट्टी सुरूच आहे तुझी, असंच वाटतंय. 
रेणू - काही नाही. झालं आता. सुट्टी संपली. इलेक्शन पण संपली. नवं सरकार - म्हणजे तेच सरकार, पण नव्यानं - आलं. कामालाही लागलं. आम्हीही कॉलेजात जायला लागलो. पण तुझा वीकएंड मूड मात्र अमर आहे.
कुणाल - म्हणजे काय रेणू? आम्ही पाच दिवस मरमर करतोच की. मग दोन दिवस जरा आराम करू दे की. आणि हो, उद्या आपली मॅच आहे ऑस्ट्रेलियाबरोबर. मी नील्याला बोलावणार आहे. बाकीची गँग पण येईल. आम्ही इकडं नुसता कल्ला करणार आहोत. 
रेणू - ए, आम्ही म्हणजे काय? मलाही बघायचीय मॅच. सईला पण बोलावते. सगळे मिळून बघू. आणि हो, आम्ही तुमची सरबराई करत बसणार नाही घरात. कळलं ना? उगाच बसल्या जागी हे आण, ते आण, हे खायला कर अशा ऑर्डर सोडायच्या नाहीत.
कुणाल - अगं बाई, अजिबात काळजी करू नकोस. नील्या सगळी व्यवस्था करणार आहे. पार्सल आणणार आहे. आणि मुळात मॅच दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे. त्यामुळं जेवणं झालेलीच असतील.
रेणू - आणि रात्रीच्या जेवणाचं काय? तुम्ही सगळे काय ते ठरवा हं...
कुणाल - अगं, ऑर्डर करणार आहे. सगळं घरी येईल. डोण्ट वरी... फक्त आपण मॅच जिंकायला पाहिजे राव. या ऑस्ट्रेलियाला हरवायला पाहिजे. मागच्या वेळी त्यांनी सेमीत आपल्याला हरवलं होतं. त्याचा बदला घ्यायला पाहिजे.

(गोंधळेकरकाका दार वाजवतात. रेणू दार उघडते.)

रेणू - या काका, या...
गोंधळेकरकाका - कसला बदला घेणारेस? बाहेरपर्यंत आवाज ऐकू येत होता कुणाल तुझा.... कशामुळं एवढा एक्साइट झालायस बाबा?
कुणाल - अहो काका, मॅच आहे ना आपली उद्या... त्याचं बोलत होतो आम्ही. ऑस्ट्रेलियाला हरवून मागच्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी आपल्याला सेमीफायनलला हरवलं होतं ना, त्याचा बदला घ्यायला पाहिजे असं म्हणत होतो. तुम्हाला काय वाटलं?
गोंधळेकरकाका - मलाही तेच वाटलं. तुला मी हेच सांगायला आलो होतो, की उद्या मॅच पाहायला मी तुमच्याकडे येऊ का?
कुणाल - या की काका. माझे मित्र-मैत्रिणी आणि बरीच गँग पण येणार आहे. पण तुम्हाला बोअर नाही ना होणार?
गोंधळेकरकाका - अरे नाही नाही. तुम्ही मित्र मित्र आहात ना... मला माझी लुडबूड कशाला? मी आपलं सहज म्हटलं. मी शिंदेंना घेऊन जोशींकडं जाईन. आमचं त्रिकूट आहेच की.
रेणू - काका, तसं काही नाही. तुम्हाला इकडं यायचं असलं, तरी येऊ शकता. मी आहे की... 
गोंधळेकरकाका - अगं, नको. आणि नंतर आपल्या मॅचेस आहेतच की. नंतर येईन कधी तरी... एवढं काही नाही. 
कुणाल - पण एक गोष्ट मात्र नक्की काका. मॅच सगळ्यांनी मिळून एकत्र बघण्यात गंमत आहे. त्यात वर्ल्ड कपची मॅच म्हणजे खास असते. 
गोंधळेकरकाका - अगदी अगदी. मला अगदी पहिल्या वर्ल्ड कपची पण आठवण आहे. तेव्हा आम्ही रेडिओवर मॅच ऐकायचो. बाळ पंडित, वि. वि. करमरकर मराठीतून कॉमेंटरी करायचे. काय सुंदर भाषा होती त्यांची... अहाहा! आणि अस्खलित मराठी शब्द... आणि भाषेवर एवढं प्रभुत्व की काही विचारू नकोस. डोळ्यांसमोर सगळं दृश्य उभं करायचे. यष्टीरक्षक, क्षेत्ररक्षण, चौकार, षटकार असे किती तरी सुंदर शब्द ते वापरायचे. 'गोलंदाज पंच आणि यष्टी यांच्या मधून जातात, उजव्या यष्टीवर मारा करतात,' असं काही तरी फार भारी बोलायचे. आणि सगळ्या खेळाडूंचा उल्लेख आदरार्थी करायचे. बाळ पंडितांचं क्रिकेटचं ज्ञान अफलातून होतं. करमरकर आकडेवारीत तरबेज होते. उत्तम स्मरणशक्ती. मागे कुठल्या सामन्यात कुणी काय केलं होतं, हे सगळे संदर्भ डोक्यात फिट्ट... पण पहिल्या दोन वर्ल्ड कपमध्ये तर आपण अगदीच लिंबू-टिंबू होतो.
कुणाल - पहिल्या वर्ल्ड कपमध्येच गावसकरनं शेवटपर्यंत नाबाद राहून ३६ धावा काढल्या होत्या ना... अगदी मंदगतीनं...
गोंधळेकरकाका - हो रे. तेव्हा आपल्याला वन-डे क्रिकेटचा काही अंदाजच नव्हता. साठ षटकं हा पठ्ठ्या टिच्चून उभा राहिला. पण उपयोग काय? इंग्लंडनं आपल्याला सपशेल हरवलं.
रेणू - पण याच गावसकरनं १९८७ च्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ९० की ९२ चेंडूंत शतक ठोकलं होतं. तेव्हाच्या मानानं ती फारच वेगवान खेळी होती. मला आठवतेय ती मॅच. मी अगदी लहान होते पण...
कुणाल - मला पण तोच वर्ल्ड कप आठवतो. १९८३ चा वर्ल्ड कप जो आपण जिंकला होता, तो अजिबात आठवत नाही.
गोंधळेकरकाका - अरे, काय धमाल आली होती. पुण्यात टिळक रोडवर हत्तीवरून साखर वाटली होती तेव्हा. आत्तासारखी न्यूज चॅनेल किंवा व्हॉट्सअप वगैरे नव्हतं तेव्हा. पण आपल्या संघाचं खूप कौतुक झालं होतं तेव्हा.
कुणाल - होय. नंतर मी ते सगळे सामने टीव्हीवर पाहिले. पण कपिलची ती १७५ धावांची अजरामर खेळी रेकॉर्डच झाली नाही. ती मात्र कायमची मिस झाली.
गोंधळेकरकाका - एक तर ती मॅच झिंबाब्वेसारख्या टीमविरुद्ध होती. आणि तेव्हा बीबीसीच्या लोकांनी संप केला होता म्हणे. त्यामुळं त्या मॅचचं चित्रीकरणच झालं नाही. पण तो सामना पाहायला गेलेले लोक भाग्यवान. त्यांना ती जबरदस्त इनिंग 'याचि देही याचि डोळा' बघायला मिळाली.
रेणू - आता सगळं किती सोपं झालंय. मोठमोठे स्क्रीन्स, एचडी क्वालिटीचं ४ के प्रक्षेपण, मोबाइलमध्ये अॅप... सगळं सगळं अगदी हाताशी...
गोंधळेकरकाका - खरंय रेणू... तंत्रज्ञानाची प्रगती खूप झाली. पण माणसं दूर गेली बघ. आता या मॅचच्या निमित्तानं लोक एकमेकांकडं जाऊन एकत्र मजा लुटत असतील तर छानच आहे.
कुणाल - अगदी बरोबर बोललात काका. मला तर ही सगळ्या मित्र-मैत्रिणींनी एकत्र येण्यासाठीची पर्वणी वाटते. आणि आपल्याकडं क्रिकेट बहुतेक सगळ्यांनाच आवडतं. आणि सगळेच त्यातले तज्ज्ञ असतात. त्यामुळं मज्जाच.
रेणू - मी तर सचिन तेंडुलकरमुळं क्रिकेट पाहायला लागले. मीच काय, भारतात जास्तीत जास्त मुली क्रिकेट पाहायला लागल्या त्या सचिनमुळंच. मला द्रविड पण आवडतो. इन फॅक्ट, खूप मुलींना द्रविड आवडतो. तो आमचा क्रश होता एके काळी... अगदी जंटलमन माणूस...
कुणाल - अगदी अगदी. सचिन, सौरभ, द्रविड या त्रिमूर्तीनं खऱ्या अर्थानं आपल्या संघात प्राण फुंकले... आता धोनी, विराट, रोहित त्यांचीच गादी चालवतायत.
गोंधळेकरकाका - मला हल्लीचं क्रिकेट तंत्राच्या फार आहारी गेलंय असं वाटतं. नैसर्गिक शैलीची गंमत वेगळी असते. जन्मजात गुणवत्तेचा प्रभावही वेगळाच असतो. हल्ली सगळं घोटवून घोटवून तयार करतात. पण चालायचंय. जमाना बदलला, की खेळही बदलणारच.
रेणू - काका, हे जगण्यातल्या सगळ्याच क्षेत्राला लागू आहे ना? 
गोंधळेकरकाका - बरोबर. मला एवढंच वाटतं, की तंत्रज्ञानानं कितीही प्रगती केली, तरी मानवी मेंदूला, त्याच्या बुद्धिमत्तेला जे एक नैसर्गिकपणाचं वलय आहे ना, त्याची बरोबरी तंत्रज्ञान कधीच करू शकणार नाही. बॉयकॉट कितीही तंत्रशुद्ध असला, तरी आपल्याला रिचर्डस किंवा ब्रायन लाराचा खेळ पाहायला जास्त आवडतो की नाही? तसंच आहे हे! 
कुणाल - व्वा काका... अगदी परफेक्ट उदाहरण दिलंत. पण आता माझीही नैसर्गिक प्रेरणा मला साद देते आहे, की मला भूक लागलीय. ब्रेकफास्ट हवा ब्रेकफास्ट...
रेणू - काय रे कुणाल? तू बाहेरून आणणार होतास ना काही तरी? मग आता काय झालं? जाऊ दे. मीच करते आता काही तरी. दडपे पोहे करते. चालेल का?
कुणाल - चालेल? अगं, पळेल, धावेल. काका, तुम्ही आता आमच्या हिच्या हातचे दडपे पोहे खाऊनच जा... म्हणजे ही आमची दडपशाहीच आहे असं समजा.
रेणू - काय रे कुणाल! काहीही बोलतोस. पण काका, खरंच थांबा आता.
गोंधळेकरकाका - अगं, काकू रागवेल मला. तिनं घरी काही तरी करून ठेवलेलं असेल. मला जायला पाहिजे.
कुणाल - अहो, मग काकूंनाही बोलवा ना इकडं. 
गोंधळेकरकाका - अरे, नको, नको. असू दे. मी थोडे खाईन पोहे आणि मग जाईन. सध्या पाण्याचं पण पाहावं लागतं रे.
रेणू - हो ना काका. खाली सोसायटीचा बोर्ड रोज पाहावा लागतो हल्ली. अजून महिनाभर तरी पाणीटंचाई सहन करावी लागणार आहे म्हणे.
गोंधळेकरकाका - अरे, त्यात काकूला सकाळी पूजेला ताजं पाणी लागतं. मग मी ते खालून नळावरून घेऊन येतो.
कुणाल - काका, मी काकूंना सांगतो. पाणी असं शिळं, ताजं वगैरे काही नसतं बरं का... तुम्ही उगाच खेटे मारत जाऊ नका. आणि घरात नळाला येत नाही का पाणी?
गोंधळेकरकाका - येतं की. पण तुझी काकू भल्या पहाटे उठते आणि देवपूजा करते. पण पाण्याचं नियोजन काटेकोरपणे करायला पाहिजे, यात काही शंकाच नाही. मी स्वतः अनेकदा घरातलं पाणी टाकून न देता, खालच्या झाडांना घालतो. शिवाय टेरेसमध्ये पक्ष्यांसाठीही पाणी ठेवतो. आता जरा वातावरण बदललंय. निदान उकाडा तरी कमी झालाय. पण गेल्या महिन्यात पक्ष्यांना फार उपयोग झाला बघ त्या पाण्याचा...
रेणू - काका, हे फार उत्तम केलंत. आम्ही पण टेरेसमध्ये पाणी ठेवायचो. पण हल्ली पक्षी कमीच झालेयत की काय, असं वाटतं मला....
गोंधळेकरकाका - निसर्गाचा समतोल ढासळतोय हेही दिसतंच आहे. पक्षी त्याचेच बळी. काय बोलायचं?
रेणू - अगदी खरंय काका. ऋतुचक्र बदललं की, त्याचा पहिला फटका या प्राण्यांना आणि पक्ष्यांना बसतो. 
कुणाल - अरे, क्रिकेटवरून सुरू झालेली गप्पा एकदमच गंभीर वळणावर गेली की. आणि हो काका, आता पक्ष्यांवर एक वेळ बोला, पण राजकीय पक्षांवर बोलायलाच नको अजिबात. फार पकलो गेल्या दोन महिन्यांत त्या चर्चांनी... 
गोंधळेकरकाका - काही नाही. अजून तीन-चार महिन्यांनी आपल्या राज्याची निवडणूक येतेय बघ. तेव्हा आपण परत त्याच उत्साहानं राजकीय चर्चा करायला लागू, यात मला तरी अजिबात शंका नाही.
रेणू - बरं, आता सगळ्या गप्पा दडपे पोहे खाताना मारा. मी आलेच. 
कुणाल - हो, आणि 'आले'वरून आठवलं, मी नंतर चहा करतो छान आलं घालून...
रेणू - कसले पीजे करतोस रे... 
कुणाल - तू जा ना.... बघ ना ते दडपे पोह्यांचं...
गोंधळेकरकाका - आणि कुणाल, तू पण चहाचं बघ हो. तोवर मी हे पेपर वाचतो.
कुणाल - काका, बाकी सगळं सोडा. पण एक गोष्ट नक्की ना? 
गोंधळेकरकाका - कोणती रे?
कुणाल - उद्या मॅच आपणच जिंकणार ना?
गोंधळेकरकाका - अरे, तसंच होवो. तथास्तु. तसं झालं तर मी तुला आमच्या घरी बोलवून स्वतः चहा करून देईन.
कुणाल - डन काका...
रेणू - मी पण येईन हं काका...
गोंधळेकरकाका - अगं, म्हणजे काय? आमंत्रण कायमच तुम्हा दोघांनाही असतं... नक्की या...
कुणाल - येस्स... थ्री चीअर्स फॉर टीम इंडिया...

(सगळे हसतात...)

----

जगणं मस्त मजेचं १५ जून २०१९
-----------------------------------

कुणाल - रेणू, ढँणटॅडँग... ये लो जी.... ब्रेकफास्ट तय्यार... हे बघ, गरमागरम कांदाभजी... अहाहा, काय सुवास दरवळतोय...
रेणू - व्वा, व्वा, व्वा... शाब्बास रे मेरे पठ्ठे... आज किती तरी दिवसांनी तू ब्रेकफास्ट केलायस... कित्ती बरं वाटतंय मला...
कुणाल - आज तुला कॉलेजला जायची गडबड आहे म्हणून केलंय मी... आता उद्या मी मित्रांकडं जाणार आहे मॅच पाहायला... आमचा फुल्ल दंगा असेल तिकडं... तू पण चल... 
रेणू - बघू रे... मला साराला पण सांभाळायचंय. तुला काय, मनात आलं की निघाली तुमची स्वारी... 
कुणाल - अगं उलट, मागच्या रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचच्या वेळी ते सगळे आपल्या घरी आले होते ना, म्हणून नील्यानं मुद्दाम या रविवारी त्याच्याकडं बोलावलंय. आणि सिस्टीम सगळी तीच. बाहेरून ऑर्डर करणार आहोत सगळं...
रेणू - काय गोंधळ घालायचा ते घाला. मला नाही रे जमणार उद्या. हा वर्ल्ड कप संपेपर्यंत हे असंच चालू राहणार आहे ना तुमचं?
कुणाल - अगं हो रेणू, म्हणजे काय आहे ना, मॅच ही अशी एकत्र, दंगा करतच पाहिली पाहिजे. मी हे मागंही बोललो ना... तुला माहितीय... ते काय म्हणतात ना हल्ली, शास्त्र असतं ते...! त्यात उद्या भारत विरुद्ध पाकिस्तान... मग काय बोलायलाच नको. तू पण खरंच चल रेणू... साराला पण घेऊन जाऊ... सई पण असेल तिकडं...
रेणू - बघू या. उद्या सकाळी ठरवते काय ते... तुला खरं सांगू का कुणाल, मला ना, रविवार संध्याकाळ एंजॉयच करता येत नाही बघ. लगेच सोमवारचे वेध लागतात. सकाळी लवकर उठायचंय, साराचं आवरायचंय, तुझा डबा, माझा डबा, ब्रेकफास्ट, मग कॉलेज... हे सगळं नाचायला लागतं बघ डोळ्यांसमोर. मग कसं एंजॉय करायचं सांग.
कुणाल - तू एक काम करतेस का? सोमवारी सरळ सुट्टी घेतेस का? नाही तर हाफ डे जा...
रेणू - कुणाल, बरा आहेस ना तू जरा? आणि कारण काय सांगू? मॅच बघत बसले रात्री म्हणून सकाळी उशीर झाला?
कुणाल - सांग की. तुला काय तुमचे प्रिन्सिपल अंगठे धरून उभं करणार आहेत का त्यांच्या ऑफिसच्या दारात? ते तरी वेळेत येतात का बघ... आपल्या देशात भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच असल्यावर सगळी कारणं खपून जातात गं...
रेणू - काही नाही हं... आमचं कॉलेज सुरू होतंय आता... आणि सगळी अॅडमिशनची वगैरे गडबड असते रे... खूप कामं असतात. मला खरंच सोमवारी सुट्टी घेणं जमत नाही कधीच... आमच्याकडं सोमवारी सुट्टी घेणं म्हणजे महापाप समजलं जातं, कळलं का?
कुणाल - कमाल आहे. तू ना, वर्कोहोलिक आहेस. तुला 'मंडे ब्लूज' वगैरे येत नाहीत का गं? मला तर मंगळवारपासूनच सुट्टीचे वेध लागतात.
रेणू - हो, हो. येतात ना. मंडे ब्लूज येतात; पण कामांचा ढीग बघितला ना, की डोळे व्हाइट व्हायची वेळ येते बाबा.
कुणाल - काही नाही. तू वर्कोहोलिक झालीयस आणि तुलाच सकाळी उठून लवकर कॉलेजला पोचल्याशिवाय बरं वाटत नाही, हेच खरं. आणि काय गं, ते अॅडमिशन वगैरे सगळी प्रशासकीय कामं असतात ना? तुझं काय त्यात काम?
रेणू - अरे, तेवढंच नसतं काही. बाकी शंभर भानगडी असतात. जाऊ दे. तुला कुठं आता सगळं सांगत बसू? अरे हो, अॅडमिशनवरून आठवलं. ती वर्षा येणार आहे रे घरी... तिला मला भेटायचं होतं. काल संध्याकाळी खाली भेटली. तेव्हा मीच तिला म्हटलं होतं, की सकाळी ये म्हणून...
कुणाल - कोण गं वर्षा?
रेणू - अरे, असं काय करतोस? त्या काणे काकांच्या फ्लॅटमध्ये राहायला आलेली ती मुलगी... डिसेंबरमध्ये आली होती बघ. सहज ओळख करून घ्यायला...
कुणाल - अच्छा अच्छा... वर्षा, नववर्षा... (हसतो) ती होय! मग आता काय मिड-इयर रिव्ह्यू घ्यायला येतेय की काय ती?
रेणू - नाही रे... बघू तरी तिचं काय काम आहे ते... ती आल्यावरच कळेल.
कुणाल - अगं, तुझी गडबड आहे ना आत्ता कॉलेजला जायची? मग आत्ता कशाला बोलावलंस?
रेणू - अरे, तिला तिच्या गावी जायचंय आज दुपारी. म्हणून मीच म्हटलं, सकाळी दहा मिनिटं येऊन जा... ब्रेकफास्ट करता करता बोलू... कुणाल, ऐक ना, एक घाणा काढ ना अजून भज्यांचा...
कुणाल - अरे व्वा... हे बरंय. तू त्या वर्षाबरोबर गप्पा मारणार आणि माझा भजीवाला करणार काय!
रेणू - नाही रे. तू पण ये की गप्पा मारायला... 

(बेल वाजते. वर्षा येते.)

रेणू - ये गं वर्षा, ये. तुझीच वाट पाहत होते.
वर्षा - उशीर नाही ना झाला मला रेणूताई?
कुणाल - रेणूताई? अरे व्वा... संस्कारी बालिका दिसतेयस गं तू... (हसतो)
रेणू (हसते) - ए अगं ताई वगैरे नको. नुसतं रेणू म्हण. चालेल...
कुणाल - चला, मी गरमागरम भजी घेऊन येतो.
रेणू - येस... ये लवकर. बोल गं, काय म्हणत होतीस? तुझ्या जॉबचं काय झालं?
वर्षा - एक छोटा जॉब मिळाला होता मला इथं आल्या आल्या. पण गेल्या महिन्यातच तो सुटला. म्हणजे मीच सोडली ती नोकरी. अगदीच किरकोळ होती ती... माझा इथला खर्च जेमतेम भागत होता. शिवाय खूप काम करावं लागायचं...
रेणू - अगं, सुरुवातीला असं व्हायचंच. पण ठीक आहे. तू आता दुसरी नोकरी शोधतेयस का?
वर्षा - हो, तो शोध तर चालूच आहे. दर आठवड्याला पेपरात येणाऱ्या नोकरीविषयक जाहिराती पाहणे, वेगवेगळ्या जॉब पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे हे सगळं सुरूच आहे. एक-दोन ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊन पण आले. बघू या...
रेणू - होईल गं... थोडा वेळ लागेल. पण चांगली नोकरी मिळेल तुला...
वर्षा - हो, पण मागच्या महिन्याचा सगळा पगार यातच संपला. आता घरून पैसे मागायला नको वाटतात. या फ्लॅटचं भाडंही खूप आहे. मी काणेकाकांना विचारलंय, इथं अजून दोघी मैत्रिणी आल्या तर चालतील का, म्हणून. मला कंपनी पण होईल आणि रेंट पण शेअर होईल. बघू या...
रेणू - घरी कोण असतं गं तुझ्या?
वर्षा - आई-बाबा सांगलीला असतात. एक मोठा भाऊ आहे. तो चेन्नईला जॉब करतोय. 
रेणू - अरे व्वा. छानच की. अगं, पण तू आज काय विचारायला आली होतीस? ते सांगितलंच नाहीस...
वर्षा - हो, ते विसरलेच. मला खरं ना, काही तरी आणखी स्पेशलाइज्ड शिक्षण घ्यायचंय... कुठला तरी कोर्स करायचाय....

(कुणाल भजी घेऊन येतो.)

कुणाल - गरमागरम भजी तय्यार... हे घ्या मॅडम... हे घ्या वर्षा मॅडम...
वर्षा (लाजते) - कुणालदादा, मॅडम काय हो?
कुणाल (हसतो) - मग हे कुणालदादा काय हो...? 
रेणू - अरे, ऐक. ती काय म्हणतीये, तिला कुठल्या तरी स्पेशलाइज्ड कोर्सला अॅडमिशन घ्यायचीय. तू सांगू शकतोस का काही कुणाल तिला?
कुणाल - घ्या. तू साक्षात मराठीची प्राध्यापिका, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, करिअर कौन्सेलर इथं बसलेली असताना मी बोलायचं म्हणजे सातवीच्या भूगोलात पहिला नंबर आलेल्या मुलानं थेट डॉ. जयंत नारळीकरांना अॅस्ट्रोफिजिक्सचे धडे देण्यासारखं आहे (हसतो)...
रेणू - कुणाल, काहीही हं तुझं... सांग की जरा तिला...
कुणाल - हे बघ... मी किचनमधून बाहेर येताना अर्धवट काही तरी ऐकलंय हिचं... तू परत सांग गं वर्षा...
वर्षा - काही नाही, मी सध्या जॉब शोधतेय. पण माझा सीव्ही जरा हेवी करण्याच्या दृष्टीनं मला एखादा स्पेशलाइज्ड कोर्स करायचा आहे. काय करू सांगा... एमबीए करू का?
कुणाल - एमबीए? अगं, आपल्याकडं अक्षरशः खंडीभर झालेयत एमबीए पदवीधर... शिवाय त्या कोर्सची फी किती आहे माहितीय का तुला? खासगी संस्थांमध्ये तर 'लाखों की बात' असते.
वर्षा - कल्पना आहे दादा. पण माझे बाबा मला शिक्षणासाठी पैसे कमी पडू देणार नाहीत. मी पण गेले वर्षभर नोकरी करत होते. थोडे फार साठवलेयत पैसे...
रेणू - ग्रेट. पण वर्षा, मला काय वाटतं, माहितीय का! कुणाल म्हणतोय ना, त्यात थोडं फार तथ्य आहे. आपल्याकडं पारंपरिक व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणारे खूप आहेत. स्वाभाविकच इंजिनीअर किंवा कॉमर्स ग्रॅज्युएट किंवा पीजीमध्ये एमबीएसारखे पदवीधर खरंच ढिगानं आहेत. त्यामुळं तेच कोर्स आपण निवडण्यात काही शहाणपण नाही गं...
कुणाल - मला तर आपली शिक्षण पद्धतीच पटत नाही. एखाद्याला नक्की कोणत्या क्षेत्रात गती आहे, हे कळेपर्यंत त्या माणसाची साठी आलेली असते. मग नंतर एकदमच माणसं सध्या करीत असलेलं काम सोडून अचानक भलतंच काही तरी करायला लागतात. म्हणजे डॉक्टर माणूस अचानक गायकच होतो, किंवा सीए असलेला माणूस हॉटेलच टाकतो, किंवा हॉटेल मॅनेजमेंटवाला एकदम ट्रॅव्हल कंपनीच काढतो...
वर्षा - वॉव... ट्रॅव्हल कंपनी... कसलं भारी ना... मला ना फिरायला खूप आवडतं. मग मी माझ्या या छंदाचं रूपांतर करिअरमध्ये करू शकेन असं वाटतंय.
रेणू - अगं, टूर आणि ट्रॅव्हल्स मॅनेजमेंटचे कोर्स असतात की...
वर्षा - एमबीएमध्ये असतात का?
कुणाल - नाही नाही. एमबीए म्हणजे बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन. पण त्यात शिकलेलं तुम्ही कुठल्याही बिझनेसमध्ये वापरू शकताच. ते वाया जात नाही. पण तुला ट्रॅव्हलिंगमध्ये इंटरेस्ट असेल, तर थेट टूर अँड ट्रॅव्हल्स मॅनेजमेंटचा कोर्स का करत नाहीस?
वर्षा - नक्कीच करीन. रेणूताई, तुझ्या कॉलेजात आहे का गं असा कोर्स?
कुणाल - यांची संस्था खूप मोठी आहे आणि तिथं अक्षरशः ढिगानं वेगवेगळे कोर्स चालतात. तिथं नक्कीच असेल...
रेणू - कुणाल, टूर अँड ट्रॅव्हल्सचा आहे की नाही, ते मी बघते. मला नक्की आठवत नाहीय असा कोर्स आहे की नाही ते...
कुणाल - ठीक आहे. नसला तरी 'गुगल'वरून माहिती काढू आपण. आपल्या इथं असा कोर्स असणारी एखादी तरी संस्था असेलच.
रेणू - हा कसा जरा वेगळा, 'हट के' कोर्स वाटतोय मला. अर्थात तिथंही कष्ट आहेतच.
कुणाल - हे बघ. कष्ट कुठं नाहीत? पण किमान हिच्या आवडीचा विषय असेल तर ती ते शिकेल ते आनंदानं... होय की नाही गं वर्षा?
वर्षा - अगदी शिकेन मी दादा. आय अॅम एक्सायटेड. मला एखाद्या ट्रॅव्हल्स कंपनीत जॉब मिळाला तर कसली मज्जा येईल! सगळं जग फिरता येईल.
रेणू - तू आज कोर्स केलास आणि तुला उद्या जॉब मिळाला, असं होणार नाही बरं का गं... आणि मिळालाच तर लगेच तुला परदेशात पाठवतील असंही नाही. आधी खालपासून शिकावं लागेल सगळं.... एखादी छोटी टूर यशस्वी करून दाखवावी लागेल. मग मोठी संधी मिळेल.
कुणाल - अर्थात. कुठल्याही क्षेत्रात गेलात तरी हे आहेच. संधी मिळविण्यासाठी आधी स्मार्टनेस अंगी असावा लागतो. आणि संधी मिळाली, की तिचं रूपांतर यशात करून दाखवावं लागतं. तेव्हा आपण एकेक पायरी चढत करिअरमध्ये पुढं जाऊ शकतो. 
वर्षा - मान्यच आहे. माझी तयारी आहे खूप कष्ट करायची. माझ्या आई-बाबांना, दादाला माझा अभिमान वाटेल असं काही तरी छान करून दाखवायचं आहे मला...
रेणू - सो नाइस....
कुणाल - करशील गं तू... मला ना तुमच्या पिढीचं कौतुक वाटतं खरंच. आता ती सायली तुझ्यापेक्षा लहान आहे पुष्कळ. पण ती कसली फोकस्ड आहे, नाही गं रेणू...
रेणू - हो ना... ही वर्षा पण तिच्या आधीची पिढी... पण तिला आपल्याला काय करायचंय हे नक्की माहिती आहे. आम्ही त्या मानानं फारच धडपडलो, नाही का रे? 
वर्षा - आम्ही पण धडपडतोय की गं ताई... आमचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. 
कुणाल - तुमच्या प्रॉब्लेम्सना 'प्रॉब्लेम्स ऑफ प्लेंटी' म्हणतात. तुमच्या पिढीकडं सगळं काही खूप प्रमाणात आहे. तुम्हाला सगळं खूप काही मिळतंय. आणि म्हणून तुम्ही कधी कधी कन्फ्जुज्ड होता... पण तरी मी तुमची पिढी खूप जास्त फोकस्ड आहे, असंच म्हणीन.
रेणू - हो, म्हणजे यांचे फंडे क्लिअर असतात. सगळं सॉर्टेड असतं. 
वर्षा - असं काही नाही गं ताई. माझंच बघ ना. अजूनही कळत नाहीय. पण आता लवकरच मला काही तरी ठरवलं पाहिजे. नाही तर आई-बाबांची लग्नाची भुणभुण सुरू होईल अजून एक-दोन वर्षांनी...
कुणाल - पण हल्ली पालक पुष्कळच समजून घेतात बरं का तुम्हाला... तुमचं मत महत्त्वाचं होतं. आमच्या आई-वडिलांना तर काही कळायच्या आत त्यांचं लग्न झालंही होतं. त्या मानानं आम्ही जरा वेळ घेऊन वगैरे लग्न केलं.
वर्षा - दादा, लग्न ही एक गोष्ट झाली. बाकी पिअर प्रेशर पण किती असतं अरे...
रेणू - खरंय तुझं वर्षा... पण तुमच्या सुदैवानं तुमच्या पिढीला कशाचा अभाव माहिती नाही. तुम्ही मागता ते सगळं हजर होतं तुमच्यासमोर. किमान बेसिक जगण्याचा लढा तरी करावा लागत नाहीय तुम्हाला... आमच्या वेळीही नव्हता. पण आमच्या आधीच्या पिढ्यांना तो लढा लढून मग स्वतःला सिद्ध करावं लागलंय...
वर्षा - खरंय ताई. मला याची जाणीव नक्कीच आहे. म्हणूनच मी आज तुमच्याकडं आले सल्ला मागायला. आता मी नक्की काही तरी असं करून दाखवीन की, तुम्हालाही माझा अभिमान वाटेल.
कुणाल - ए रेणू, ही असं बोलून आपल्याला एकदम मागच्या पिढीत वगैरे ढकलून टाकतेय बघ....
वर्षा - ए, असं नाहीय हं काही.
रेणू (हसत) - अगं, तुझ्या दादाला म्हातारं वगैरे करू नकोस बाई इतक्यात. आत्ता कुठं त्याला विसावं वर्षं लागलंय... 
कुणाल - रेणू, चेष्टा बास हं... पण वर्षा खरं सांग. तुला मी वाटतो मोठा?
वर्षा (हसत) - हो, म्हणजे तू दादाच आहेस की रे...
कुणाल (लटके रागावून) - हे बरंय. आमची भजी खाऊन, आमचे फुकटचे सल्ले घेऊन वर आमचीच बदनामी...
वर्षा (हसते) - सॉरी सॉरी हं दादा...
कुणाल - अरेच्चा, परत दादा... आता हिला कुठल्या तरी टूरवर पाठवून दिलं पाहिजे...
रेणू - तू स्वतःची ट्रॅव्हल कंपनी काढ गं वर्षा. आणि तुझ्या पहिल्या ट्रिपला आम्ही तुझ्याकडं बुकिंग करू...
वर्षा - वॉव... कसलं भारी बोललीस ताई. मला 'आज मैं उपर, आसमाँ नीचे' असं वाटायला लागलेलं आहे...
कुणाल (चेष्टेत हसत) - हो, पण आमच्या सोफ्यावर नाचू नकोस हं वर्षा... 
रेणू - कुणाल, अरे...
वर्षा (हसते) - नाही नाही. निघते मी आता... थँक्स फॉर द भजी...
रेणू - हो. नीट जा... यू विल रॉक बेबी...

(सगळे हसतात.) 

---

जगणं मस्त मजेचं २२ जून १९ 
----------------------------

(पार्श्वभूमीवर हॉटेलमधील लोकांचे आवाज...)

कुणाल - अहाहा, किती बरं वाटतंय... खूप दिवसांनी 'खादाडेश्वर'ला आलो. किती दिवसांनी आज आयता ब्रेकफास्ट मिळणार आहे... वा... वा... वा...
रेणू - खरंय. असा कधी तरी ब्रेक बरा वाटतो रे... पण मला इथली गर्दी बघून असं वाटतं, की हल्ली लोक घरी ब्रेकफास्ट करतच नसावेत.
कुणाल - अगं, सगळे घरी ब्रेकफास्ट करायला लागले तर 'खादाडेश्वर'वाल्याचं पोट कसं भरेल? तेव्हा चाललंय ते छान आहे...
रेणू - हं, आणि या अशा पावसाळी हवेत गरमागरम डोसे, उत्तप्पे, भजी, मिसळी असं रिचवायला जाम मजा येते...
कुणाल - चला, एवढ्या एका गोष्टीत तरी एकमत झालं आपलं... चला, ऑर्डर देऊ या... तिथं मात्र आपलं एकमत होईलसं वाटत नाही. मला आप्पे हवेत.
रेणू - आणि मला मसाला डोसा...
कुणाल - वाटलंच. सांगून टाक.
रेणू (वेटरला) काका, एक मिनिट. आमची ऑर्डर घेणार? एक आप्पे द्या आणि एक मला मसाला डोसा... चटणी दोन वाट्या द्या हं...
कुणाल - आणि नंतर आपली फेवरिट फिल्टर कॉफी...
रेणू - अरे व्वा... आज मस्त मूड दिसतोय एका माणसाचा...
कुणाल - आता मी 'हहह' असं हसू का? 
रेणू - कुणाल, गप रे... कुठंही सुरू होतोस तू... 
कुणाल (हसत) - कुठेही विनोद करणे आणि वटवट करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो बजावणारच.
रेणू - बजाव, बजाव... 
कुणाल - बजावतोच आहे. भितो की काय कुणाला? बाय द वे, 'वटवट'वरून आठवलं, मागच्या रविवारी वटपौर्णिमा होती ना गं? आपल्या आणि पाकिस्तानच्या मॅचच्या नादात मी विसरूनच गेलो. तू केलीस ना पूजा वडाची? जन्मोजन्मी हाच पती मिळू दे म्हणून? (हसतो...)
रेणू - हा हा हा... मी आणि वटपौर्णिमेची पूजा? बरा आहेस ना? या जन्माचा नीट पत्ता नाही आणि सात जन्मांचं कुणी बघितलंय?
कुणाल - अगं ए, सीरियस काय होतेयस एकदम? वटवट या शब्दावरून उगाच कोटी करायचा प्रयत्न होता तो... मला माहिती आहेत तुझी या विषयावरची मतं... 
रेणू - हे बघ. मी कुणाच्या श्रद्धेचा अनादर करत नाही. तसंच माझे म्हणून जे विचार आहेत, त्याचाही कुणी अनादर करू नये एवढंच माझं म्हणणं.
कुणाल - अगं हो हो हो, मी काही म्हटलंय का तुला? बाकी तुम्ही बायका लग्न झाल्या झाल्या आम्हाला रिळाला सूत गुंडाळावं तसं दोन मिनिटांत गुंडाळून ठेवत आलेला आहात. तुम्हाला वेगळं सूत गुंडाळायची गरजच काय?
रेणू - आणि मुळात दोन माणसांत प्रेम असलं म्हणजे झालं. त्याचं अशी प्रदर्शन करायची काहीही आवश्यकता नाही, असं माझं मत आहे.
कुणाल - अगदी खरंय. मान्यच आहे. जाऊ दे. 
रेणू - नाही नाही. असं कसं? थांब ना. होऊनच जाऊ दे. मला सांग, आम्ही बायकांनी नवऱ्याचं प्रतीक म्हणून गळ्यात मंगळसूत्र घालायचं, वडाची पूजा करायची... पुरुष काय करतात रे? सांग ना...
कुणाल - आम्ही आपलं ते हे...
रेणू - काहीही करत नाही तुम्ही. मला याचाच राग येतो.
कुणाल - रेणू, रेणू, बास. विषय वटवटीकडून कटकटीकडं जायला लागला आहे. आधीच अलर्ट देतो. 
रेणू (हसते) - आता का? तुम्हाला इथं काही डिफेन्सच नाहीये लक्षात ठेव. 
कुणाल - बरं बाई. मी उद्यापासून मंगळसूत्र घालत जाईन तुझ्या नावाचं. आणि सूत गुंडाळायला कुठलं झाड बरं पडेल? वड नको. त्यापेक्षा बकुळ बरी नाही ना...
रेणू - छान. त्यातल्या त्यात स्त्रीलिंगी झाड शोधलंस ना... तुम्हा पुरुषांचं हे असंच आहे.
कुणाल - अरे देवा, अगं माझ्या डोक्यातही हे आलं नाही. झाडात कसला जेंडर बायस आणतेयस?
रेणू (लटक्या फणकाऱ्यानं) - तूच बघ. तुला पिंपळ, बाभूळ, कडुलिंब, जांभूळ, आंबा असं कुठलंही झाड आठवलं नाही. बकुळ म्हणे. माहितीये तरी का बकुळीचं झाड कसं दिसतं ते? 
कुणाल - ती एक कविता होती बघ लहानपणी. 'बकुळीच्या झाडाखाली फुलं वेचू या...' 
रेणू - सोड रे. तुम्ही भुंगेच आहात सगळे पुरुष. या फुलावरून त्या फुलावर...
कुणाल - अरे देवा. अगं, का सटकलीयेस अशी आज? (वेटर डोसा आणून ठेवतो) हे बघ, तुझा डोसा आला. आता गरमागरम डोसा खा आणि गार हो...
रेणू - आहा, बरं झालं. वेळेत आला डोसा. वाचलास तू...

(तेवढ्यात प्रकाश येतो.)

प्रकाश - नमस्कार कुणालभाऊ. ओळखलं का? मी प्रकाश. महिन्या-दीड महिन्यापूर्वी तुमच्या घरी आलो होतो बघा.
कुणाल - अरे हो हो. आहे की लक्षात. इकडं कुणीकडं? बस ना...
रेणू - अरे प्रकाश, ये. बस. काय म्हणतोयस?
प्रकाश - नमस्कार वहिनी. नाही, बसत नाही. माझा एक मित्र यायचाय भेटायला. त्याची वाट बघतोय. तुमचं चालू द्या. 
कुणाल - अरे, मग मित्र येईपर्यंत बस की आमच्यासोबत. गप्पा मार. काय म्हणतोयस? तुझ्या जॉबचं काय झालं? मागे मी तुला एक-दोन काँटॅक्ट दिले होते, तिकडं जाऊन आलास का?
प्रकाश - हो कुणालभाऊ. पण जॉबचं काही जमलं नाही. त्याचं कसं झालंय, जिथं काम आवडतं, तिथं पगार आवडत नाही आणि जिथं पगार बरा आहे तिथं काम आवडत नाही.
कुणाल - ही गोची आहे खरी. अरे पण, तुला गरज आहे तर स्वीकारायचा ना जॉब तात्पुरता. 
प्रकाश - तसं मी आत्ता बी करतोय की एक जॉब... पण त्यात काही मजा नाही. खरं सांगू का? मी निर्णय घेतलाय भाऊ. मी गावाकडं परत जाणार.
कुणाल - अरे व्वा... हे फारच बेश्ट आहे मग... 
रेणू - तिकडं काही इमर्जन्सी आली का?
प्रकाश - नाही वहिनी, तसं नाही. मी स्वतःच ठरवलंय. आमचं गाव म्हणजे एकदम खेडं आहे. तिथं नोकरी-बिकरी मिळणं शक्यच नाही. पण मी बिझनेस करणार आहे. बी-बियाण्यांची एजन्सी मिळतेय मला. बार्शीला मेन डीलर आहे. त्याचा सब-डीलर म्हणून काम करायचं. आजूबाजूची चार-पाच गावं बी मिळालीत मला. 
कुणाल - अरे व्वा. एकदम आनंदाची बातमी दिलीस प्रकाश तू... खरं तर तुझ्याकडून पार्टीच घ्यायला पाहिजे आता...
प्रकाश - पार्टी नक्की देणार भाऊ. आता गावाकडं जातो. जरा धंदा सेट करतो. मग तुमीच या गावाकडं आमच्या. मागल्या टायमाला बी मी तुम्हाला हुरड्याला बोलावलं होतं. स्टँडिंग इन्व्हिटेशन आहे बघा. कधीही या डिसेंबर-जानेवारीत. पार्टी करूच...
रेणू - प्रकाश, मग सगळ्यांत काय आवडलंय माहितीय का? जॉब मिळत नाही म्हटल्यावर तू खचून न जाता, वेगळा मार्ग शोधायचा प्रयत्न केलास. 
प्रकाश - खरंय वहिनी. नीलेशभाऊनं बी खूप मदत केली. अहो, सोपं नाहीये खेड्यात हे असं बिझनेस करणं. शहरात एक बरंय. कुणी कुणाच्या अध्यात नसतं की मध्यात नसतं. गावात तसं नाही. माणसं कमी. सगळेच एकमेकांना ओळखणारे. त्यात रोजगाराच्या किंवा पैसे कमावायच्या संधी बी कमी. त्यात राजकारण लई असतंय. तंगड्यात तंगड्या.
रेणू - काय सांगतोस? कहर आहे हं...
कुणाल - खरंय रेणू प्रकाश म्हणतोय ते. मी नील्याकडून ऐकलंय एक-दोनदा हे...
प्रकाश - मग काय हो? डीलरशिप भेटण्यासाठी बराच जुगाड करावा लागला. पण काही का असेना, आता ते सगळं मार्गी लागलंय. मी ठरवलंय. आता मागं हटायचं नाय. माझा धंदा बी व्हईल आणि गोरगरीब शेतकऱ्याची सेवा बी हुईल.
कुणाल - सेवा कशी काय?
प्रकाश - म्हंजे असं आहे कुणालभाऊ, माझ्या दुकानातून गरजू शेतकरी रिकाम्या हातानं परत जानार न्हाय. लगीच पैसा नसला, तरी त्याला बी-बियाणं दिल्याबिगर मी जाऊ देणार न्हाय.
रेणू - पण काय रे, मी ऐकलंय, की शेतकऱ्यांना सरकारच फुकट बी-बियाणं देतं म्हणून. मग त्यांना विकत कशाला घ्यावं लागेल तुझ्याकडून?
प्रकाश - अहो वहिनी, सगळ्यांना नाही भेटत. त्याच्या लई अटी-शर्ती असत्यात. शिवाय ते वेळेत भेटणं महत्त्वाचं असतं. एक मात्र आहे, की आता सरकारनं शेतकऱ्यांसाठी भरपूर काय काय योजना आणल्यात. लोकांनी नीट माहिती करून घ्यायला पाहिजे. 
कुणाल - अरे, टीव्ही किंवा आकाशवाणीसारख्या प्रसारमाध्यमांतून ही माहिती वारंवार दिली जात असते. हल्ली तर शेतकऱ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप पण आहेत आणि त्यावर हवामानाचे अंदाज दिले जातात असं मी ऐकलंय.
प्रकाश - मी तेच म्हटलं. गरज आहे ती फक्त थोडं जागरूक राहण्याची. कसंय कुणालभाऊ, मी दोन महिने इथं शहरात राहिलो. सगळी परिस्थिती बघितली. इथलं वातावरण बघितलं. खूप गर्दी झालीय हो आपल्या शहरांत. सगळे शहरांत येऊन राहिले तर कसं व्हायचं? म्हणून मी मुद्दाम गावी परत जायचं ठरवलंय. तिथंच राहायचं, जम बसवायचा, टिकून राहायचं.
रेणू - अगदी योग्य बोललास. आता आपल्याकडं खरंच रिव्हर्स मायग्रेशनची गरज आहे.
प्रकाश - म्हणजे?
रेणू - म्हणजे हेच. तू जे करतोयस ते. आतापर्यंत खेड्यांतून शहरांकडं लोंढे येत होते. आता शहरांकडून खेड्यांकडे जायला पाहिजे.
कुणाल - हे तसं आदर्शवादीच बोलणं झालं रेणू. पूर्वी असं म्हणायचे, एकदा मुंबईत आलेला माणूस कधीही ते शहर सोडून परत जात नाही. आता पुण्याविषयीही तेच म्हणायची वेळ आलीय. कोणी शहर सोडून जात नाही बघ. आता हा प्रकाश म्हणजे अपवाद. शिवाय तो मुळातच इथं कायमचा राह्यला आला नव्हता.
प्रकाश - कायमचा आलो नव्हतो हे खरंय. कसंय बरं का, माझ्यासारखे अनेक तरुण येताना 'तात्पुरते' म्हणूनच येतात आणि कायमचे शहरातलेच होऊन जातात. त्यांना इथल्या लाइफस्टाइलची सवय होऊन जाते. चटकच म्हणा ना!
कुणाल - खरंय. पण इथली गर्दी आत्ताच नियंत्रणाच्या बाहेर चाललीय बघ. कधी तरी याचा कडेलोट होईलच. त्यापेक्षा प्रकाश करतोय ते किती योग्य आहे!
रेणू - अगदी बरोबर. पण त्याला रोजगाराची किंवा बिझनेसची संधी मिळाली म्हणून. तशी संधी खेड्यातून शहरात येणाऱ्या प्रत्येक तरुणाला मिळायला पाहिजे. तरच हे 'रिव्हर्स मायग्रेशन' शक्य होईल.
कुणाल - बरं, गंभीर चर्चा खूप झाली. प्रकाश, तू काय खाणार सांग. मी आप्पे सांगितले आहेत.
प्रकाश - नको भाऊ. मित्र येईल एवढ्यात. मग आमचं काही तरी खाणं होईलच.
कुणाल - अरे घे रे. आपली भेट आज अचानकच झाली. आता परत कधी भेटशील कुणाला माहिती!
प्रकाश - असं कसं? तुम्ही येणार आहात ना आमच्या रानात हुरडा खायला? नीलेशभाऊ येत असतो. त्याच्याबरोबर या.
रेणू - हो, आम्ही आज भेटणारच आहोत. तो येतोय दुपारी आमच्याकडं. नेहमीप्रमाणे यांची गँग मॅच पाहायला एकत्र जमणार आहे.
प्रकाश - अरे वा. हे भारीच झालं. मग आजच ठरवून टाका. 
कुणाल (हसतो) - अरे, आमचं काय दोन मिनिटांत ठरेल. सध्या वर्ल्ड कप सुरू आहे ना, त्यामुळं वारंवार भेटताहेत सगळे मित्र. 
प्रकाश - खरंय. तो एक खेळ असा आहे, की सगळा देश एकत्र येतो जयघोष करायला.
रेणू (हसते) - आजही आपण जिंकणार. धावांचा पाऊस पडणार...
प्रकाश - पडू पडू द्या. आणि आपल्याकडं पण खराखुरा पाऊस पडू द्या. मिरगा गेल्या, आता आदरा (आर्द्रा) पडू द्या हत्तीवाणी... मग पेरण्यांना जोर येईल. शेतकऱ्यासाठी दर वर्षीच ह्यो पेरणीचा वर्ल्ड कप असतोय बघा.
कुणाल - पडणार पडणार. पाऊस धावांचाही पडणार आणि खराखुराही पडणार... आप्प्यांची शपथ! अहाहा...
रेणू - कुणाल, काय रे? अप्प्यांची शपथ काय?
प्रकाश (हसतो) - वा, कुणालभाऊ व्वा... तुमच्या तोंडी आप्पेच आप्पे पडोत...

(सगळे हसतात...) 

---

जगणं मस्त मजेचं २९ जून २०१९
-------------------------------

रेणू - बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव...
कुणाल - अहाहा रेणू, सकाळी सकाळी अगदी देव आठवलेच बघ... आणि केवळ विठ्ठलच बोलतोय असं नाही, तर माझे पायही आता 'विठ्ठल विठ्ठल' असं बोलतायत...
रेणू (हसून) - बरं झालं. त्यानिमित्ताने तुझ्याकडून निदान देवाचं नाव घेणं झालं. पण त्यानिमित्तानं तू वारीत चाललास हे काय कमी आहे?
कुणाल - अगं, म्हणजे काय? माझी किती तरी दिवसांची इच्छा होती. अखेर आमच्या गँगनं मनावर घेतलं म्हणून सगळ्यांसोबत जाता आलं. पण ही काही माझी पहिलीच वेळ नव्हती बरं का... यापूर्वी मी कॉलेजात असताना गेलोय वारीसोबत...
रेणू - हो, माहितीय. खडकी ते सीओईपी... (हसते)
कुणाल - असू दे, असू दे. तेवढं का होईना, पण चाललो ना. आमच्या कॉलेजतर्फे खूप काय काय उपक्रम राबवले जायचे तेव्हा वारकऱ्यांसाठी! म्हणजे अजूनही राबविले जातात. पण मी कॉलेजात असताना त्यात भाग घेत होतो, इतकंच सांगायचं आहे बरं का मला...
रेणू - माहितीय रे. मी पण केलीय वारी. आळंदी ते पुण्यापर्यंत का होईना, पण मी चार पावलं चालले आहे वारीत...
कुणाल - काय गंमत आहे ना रेणू, आपल्या शहरातलं सगळं वातावरणच बदलून जातं या वेळी. एक तर मस्त पाऊस पडून गेलेला असतो. सगळीकडं हिरवंगार व्हायला सुरुवात झालेली असते. त्यात ही वारी येते आणि वातावरणात एकदम ते अष्टसात्त्विक का काय म्हणतात, तसले भाव जागे होतात.
रेणू - अगदी अगदी. तुझ्यासारख्या एरवी फार देव देव न करणाऱ्या माणसालाही वारीत चालावंसं वाटतं, तो भक्तीचा फील घ्यावासा वाटतो ना, हे फार महत्त्वाचं आहे.
कुणाल - तुला खरं सांगू का रेणू... माझं देव नावाच्या संकल्पनेशी भांडण नाहीच आहे मुळी. माझं भांडण आहे ते बिनडोक कर्मकांडांशी. त्यामुळं मला ना, कर्मकांडापेक्षा आपल्या या सगळ्या लोकपरंपरा जास्त आवडतात. नव्या कोऱ्या पांघरूणाला एक प्रकारचा परकेपणा असतो. ते पांघरूण टोचतं. त्याउलट आजीच्या किंवा आईच्या साडीपासून केलेल्या रजईची मऊसूत ऊब कशी हवीशी वाटते ना, तशा मला आपल्या या लोकपरंपरा वाटतात.
रेणू - अहाहा, काय आठवण काढलीस रे... रजई किंवा गोधडीच खरं तर ती... सिल्कच्या हजारो रुपयांच्या पांघरूणाला सर नाही बघ या घरगुती रजईची...
कुणाल - माणसाच्या जगण्यात हे असे मऊ, हळवे कोपरे हवेतच. नाही तर आयुष्य फारच वैराण होऊन जाईल. प्रत्येक माणूस आपला असा कम्फर्ट शोधत असतो. महाराष्ट्रातल्या हजारो, लाखो लोकांना या वारीतून त्यांच्या जगण्यातला हा कम्फर्ट मिळत असावा.
रेणू - मिळत असावा काय, मिळतोच. मला तर वारीतल्या बायका पाहून असलं भारी वाटतं ना. साध्यासुध्या, पण कणखर हाडाच्या या सगळ्या बायका. हजारो संसार आपल्या दणकट खांद्यावर पेलणाऱ्या... एके दिवशी संसाराची आसक्ती काही काळ का होईना, सोडून एकदम घराबाहेर पडतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा मुक्तीचा आनंद दिसतो मला!
कुणाल - अगं, असतोच तो. संसाराच्या रामरगाड्यात वर्षभर अडकलेल्या या बायकांना कुठं साधं घराबाहेर पडणं अवघड, तर गावाबाहेर अशक्यच. आता जरा चित्र बदललंय. पण फार नाही. हजारो बायका अजूनही खेड्या-पाड्यांत या संसाराच्या चक्रात अडकून पडल्या आहेत.
रेणू - त्यात चुकीचं काहीच नाही. पण माणसाला बदल हवाच असतो रे. यानिमित्ताने त्यांची रोजच्या धबडग्यातून सुटका होत असेल बघ. या बायकांना त्यांच्या हक्काची सुट्टी आणि सहलीचा आनंद अशा दोन्ही गोष्टी मिळवून देते ही वारी! का नाही आवडणार त्यांना मग?
कुणाल - एकदम खरंय. मुळात मला वारीत स्त्री आणि पुरुष यांच्यात काही भेदच जाणवत नाही. एकदा 'माउली'ची लेकरं म्हटली, की कोण स्त्री आणि कोण पुरुष... दोघांमध्येही मुक्तीचाच आनंद दिसतो मला. लोक म्हणतात, देव कुठं आहे? कुठं भेटतो? मी तर म्हणतो, अरे, यातल्या प्रत्येक माणसाचा आनंदानं उजळलेला चेहरा बघा. माउलींच्या चरणांवर डोकं ठेवायला मिळाल्यानंतर त्यांचे डोळे पाहा. देव अजून कुठं कशाला शोधायला पाहिजे?
रेणू - अगदी खरं... या वारीचं वेगवेगळ्या समाजशास्त्रज्ञांनी विश्लेषण करायचा प्रयत्न केलाय. लाखो लोक एकाच ठिकाणाहून, एकाच हेतूनं, एकाच दिशेनं प्रवास करताहेत, तेही पाचशे वर्षांहून अधिक काळ - हे जगात कुठंच नाही. यामागं मला तरी सगळ्यांत महत्त्वाची वाटते, ती म्हणजे मुक्तीची भावना.
कुणाल - बरोबर. संसारात असूनही नसल्यासारखी ही अवस्था. अल्पकाळाची विरक्ती... भावविरहित अवस्था... ही सगळ्यांना हवीच असते. आपण सगळेच काही संत होऊ शकत नाही. आपण साधीसुधी माणसं. आपल्या पाप-पुण्याच्या हिशेबात सतत दोलायमान होणारी. पण कुठं तरी ही अशी संधी मिळते आणि माणसं ती घेतात. 
रेणू - वारीच्या निमित्तानं सगळा समाज एकत्र येतो, ही घटना मला फार महत्त्वाची वाटते बघ. पुण्यात किती तरी ठिकाणी या वारकऱ्यांसाठी सर्वधर्मीय लोक मदत करतात. त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करतात. कुणी चपलांची व्यवस्था करतात, तर कुणी छत्र्यांची. सामाजिक बांधिलकी, सलोखा वगैरे शब्द आजकाल फार कृत्रिम वाटू लागलेयत. पण हे शब्दही अस्तित्वात नव्हते, तेव्हापासून आपल्याकडं कृती होत होती तशी. 
कुणाल - अगदी. म्हणूनच मी आता ठरवलंय. दर वर्षी थोडी थोडी पायी वारी करायची. अजून पाच-सहा वर्षांनी कदाचित मी पूर्ण वारी पण करीन.
रेणू - व्वा, कुणालमहाराज. मग तर आपल्या पायाचं तीर्थच घेतलं पाहिजे.

(दिघेकाकू आत येतात.)

दिघेकाकू - रेणू, येऊ का गं? कसलं तीर्थ वाटतीयेस?
रेणू - काकू, या, या. अहो, काही नाही. कुणाल वारीत चालून आला ना. आता त्याला खूप उत्साह आलाय. म्हणतोय, की कधी तरी पूर्ण वारी करीन. मग मी म्हटलं, की तू अशी वारी पूर्ण केलीस तर तुझ्या पायाचं तीर्थ घेतलं पाहिजे. (हसते)
दिघेकाकू - वा, वा. कुणाल, खरंच जाऊन आलास काय रे... नमस्कार करते बघ मी आत्ताच तुला.
कुणाल - अहो अहो काकू, काय करताय. मला कशाला नमस्कार.
दिघेकाकू - अरे, हा तुला नाही काही नमस्कार. वारीला जाऊन आलास ना. पालखीचं दर्शन घेतलंस ना, म्हणून...
कुणाल - काकू, खरं सांगू का, मला आवडतात आपल्या या परंपरा. एवढा मोठा लोकसमूह एखादी गोष्ट इतक्या फ्रिक्वेंटली, एवढी वर्षं करत असेल, तर आपल्याला त्याविषयी किमान कुतूहल वाटलं पाहिजे ना...
दिघेकाकू - खरंय बाबा तुझं. मी फार पूर्वी गेले होते वारीला. आता वयोमानानुसार, इथल्या इथं पालखीच्या दर्शनालाही जाणं होत नाही. पाय भयंकर दुखतात माझे. हल्ली गर्दी किती असते आणि... त्यापेक्षा ते टीव्हीवर दाखवतात तेव्हा मी आपली तिथंच दर्शन घेते झालं.
रेणू - काकू, योग्यच आहे. तुम्ही नाहीच करायची ही दगदग. आणि खरं सांगू का, ज्यानं त्यानं आपापल्या कामात आपला 'विठ्ठल' शोधावा.
कुणाल - व्वा रेणू व्वा... क्या बात है... कोट ऑफ द डे हं... कोट ऑफ द डे... भिंतीवर कोरून ठेवू का हे मी? कसलं भारी वाक्य टाकलंस. ज्यानं त्यानं आपल्या कामात आपला 'विठ्ठल' शोधावा... व्वा... ग्रेट...
रेणू - थट्टा करतोयस की खरंय म्हणतोस रे? काही कळत नाही तुझं...
कुणाल - नाही, नाही. आत्ता थट्टा मुळीच नव्हतो करत. खरंच आवडलं अगं... कधी कधी तू बोलतेस की बरं... (हसतो)
दिघेकाकू - तुझं खरंय रेणू. पण कधी कधी आपण असहाय झालोय की काय, अशी भावना येतेच गं मनात...
रेणू - अजिबात असं काही मनात येऊ देऊ नका. आता तुम्ही ही एवढी छोटी मुलं सांभाळताय पाळणाघरात. किती छान गोष्ट आहे ही. आणि मुलांमध्ये देवतत्त्व असतं, असं आपणच म्हणतो की! तुमच्या अवतीभवती हे छोटे छोटे देवच बागडत असतात दिवसभर... तुमच्याएवढं देवाचं सान्निध्य कुणाला लाभतं सांगा.
कुणाल - व्वा. रेणू, आज म्हणजे तू सिक्सरमागं सिक्सर मारतीयेस. पण अगदी खरंय तुझं... आपल्या कामात आनंद शोधावा. आपल्याला रोजीरोटी देणारं आपलं काम हाच आपला देव असं मानलं की गोष्टी फार सोप्या होतात.
दिघेकाकू - हे मला अगदी पटलंय बघ रेणू... माझ्याकडं ही सगळी मुलं आहेत, त्यांना सांभाळण्यात माझा वेळ छान जातो आणि नामस्मरण सतत सुरूच असतं महाराजांचं... त्यामुळं मला वेगळी पूजाअर्चा असलं काही करावं लागत नाही बघ.
रेणू - किती छान आहे हे... बरं, काकू, तुम्ही आत्ता सहजच आला होतात ना? की काही काम होतं?
दिघेकाकू - हो अगं, फार काही मोठं काम नाही. पाळणाघर सुरू होऊन आता महिना होत आला. त्या गडबडीत तुझ्याकडं यायचं राहून गेलं होतं. आणि आज सकाळी हे दडपे पोहे केले होते, म्हटलं, थोडा नमुना देऊन यावं तुझ्याकडून...
कुणाल - व्वा, व्वा काकू... अन्नदानानंसुद्धा 'विठ्ठल' भेटतो बरं का आपल्याला. तुम्हाला तो आत्ता ऑलरेडी भेटलेला आहे. बघू ते दडपे पोहे...
रेणू - कुणाल, अरे काय हे? सारासुद्धा एवढा हट्ट करत नाही. थांब जरा. नीट बशीत घालून देते. मग खा.
कुणाल - दे लवकर. आणि काकू, तुमचे ते पौष्टिक लाडू आहेत का हो?
दिघेकाकू - लाडू आता मुलं फस्त करतात बाबा. तुझ्यासाठी वेगळे करते आता...
कुणाल - करा, करा... काकू, तुम्हाला आत्ता माझ्यात देव दिसला होता ना. पाया पडत होतात माझ्या. मग आता नैवेद्य नको का या देवाला?
दिघेकाकू - देणार आहे. आणि देव नैवेद्य खात नाही बरं का. त्याला नैवेद्य दाखवून आम्हीच खात असतो तो. तेव्हा बघ. तुला देव व्हायचंय की आपला कुणालच बरंय ते?
रेणू (हसत) - काकू, खरंच काही दिवसांनी यालाच तुमच्या पाळणाघरात ठेवायची वेळ येणार आहे. आत्ता अगदी वारीवर फार आध्यात्मिक वगैरे चर्चा करत होता. आणि भूक लागली, की संपलं सगळं अध्यात्म. कुणालमहाराज, संयम ही अध्यात्माकडं जाण्याची पहिली पायरी आहे, हे लक्षात ठेवा.
कुणाल - कुणी काढलाय हा नियम? आम्हाला नको तो. आम्ही भरपूर खाऊ-पिऊ आणि मग ती आध्यात्मिक चर्चा... नाही तरी 'आधी पोटोबा आणि मग विठोबा' असं म्हटलंच आहे.
दिघेकाकू - म्हणूनच अध्यात्म सोपं नसतं. आपल्याकडं लोक अध्यात्माविषयी बोलतात भरपूर; पण ते आचरणात कुणी आणत नाही. कारण बोलणं नेहमीच सोपं. सगळ्यात असूनही नसल्याचा भाव मनात आणता येणं खूप अवघड आहे कुणाल. समाधानी विरक्तीचा हा टप्पा गाठता यायला हवा बघ.
रेणू - काकू, तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. आम्ही अजून लहानच आहोत त्या टप्प्यापर्यंत यायला. पण डोळ्यांसमोर ते उद्दिष्ट आत्तापासून असायला पाहिजे हे नक्की. 
कुणाल - रेणू, आता माझे पाय खरंच 'विठ्ठलनामाचा टाहो' फोडताहेत. 
रेणू - थांब, तुला बादलीत गरम पाणी आणून देते. त्यात पाय ठेवून बस थोडा वेळ...
दिघेकाकू - वारी काय किंवा रोजच्या जगण्यातलं अध्यात्म काय, पायाला त्रास आहेच. एकदा तो पाय किंवा पाया भक्कम झाला की मग पुढचं सगळं सोपं. आणि हा पाया आहे विरक्तीचा... सगळ्या मोहपाशातून दूर जाण्याचा... देव आपोआप भेटतो मग...
कुणाल - काकू, तुमचं अगदी खरंय. पण सध्या तरी आम्ही ऐहिकातच रमलो आहोत. कदाचित सगळे भोग भोगून व्हायचे असतील. तो टप्पा आला की आपोआप विरक्ती येत असेल. भरपूर जेवल्यानंतर जसं काही खाण्याची इच्छा उरत नाही, तसंच या विरक्तीचं असावं.
दिघेकाकू - तसंच आहे. पण प्रश्न एवढाच आहे, की किती जेवलं म्हणजे आपलं पोट भरलं, हेच आपल्याला कळत नाही. त्यामुळं आपण खात सुटतो सतत.
रेणू - अगदी बरोबर. फार सूचक आहे हं काकू हे वाक्य...
दिघेकाकू - काय करणार? अनुभव बोलतो बाई... असो. चला, निघते, आमच्या छोट्या देवांचा नैवेद्य करायचा आहे अजून... येते... 
कुणाल - बोला, पुंडलिक वरदा हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम... पंढरीनाथ महाराज की जय...

(सगळे हसतात...)

(शेवटी हरिनामाचा गजर...)

---