स्पाय स्टोरीज - मी पाकिस्तानातील भारताचा हेर
---------------------------------------------------
थरारक अन् भयावह...
-------------------------
सध्या ‘धुरंधर’ हा नवा हिंदी सिनेमा गाजतो आहे. दोन भागांत प्रदर्शित झालेल्या या सिनेमात पाकिस्तानात जाऊन देशासाठी कामगिरी बजावणाऱ्या गुप्तहेराची कथा सांगण्यात आली आहे. हेरकथा फार पूर्वीपासून वाचकप्रिय आहेत. जगभरातल्या गुप्तहेरांचे नानाविध किस्से, अनुभव. त्यांचे चित्तथरारक जीवन यांचे आकर्षण सर्वसामान्य वाचकांना असते. एरवी जी गोष्ट आपण कल्पनेतही करू शकणार नाही, अशा गोष्टी ही हेरमंडळी लीलया करत असतात. तीही शत्रुदेशांच्या गोटात जाऊन! अतिशय हुशार मेंदू, ताकदवान शरीर, लवचीक अन् पाण्यासारखा स्वभाव, प्रचंड धैर्य, कष्ट वा जाच सोसण्याची शारीरिक व मानसिक तयारी अशा अनेक गुणांनी युक्त असलेल्या व्यक्तीलाच हेर म्हणून नेमलं जातं. त्यामुळं या हेरांच्या जीवनाचं, त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या चित्तचक्षुचमत्कारिक घटनांचं स्वाभाविक आकर्षण सर्वांनाच असतं. वाचकांची हीच भूक भागविण्यासाठी रोहन प्रकाशनानं ‘स्पाय स्टोरीज’ या मालिकेअंतर्गत जगभरातील नामवंत हेरकथा मराठीत अनुवादित करून वाचकांसमोर आणल्या आहेत. मोहनलाल भास्कर यांचं ‘मी पाकिस्तानातील भारताचा हेर’ हे पुस्तक याच मालिकेतील. मोहनलाल भास्कर यांच्या विलक्षण अनुभवांमुळे हे पुस्तक रंजक, वाचनीय आणि तितकेच थरारक झाले आहे. ऋजुता कर्णिक-गुप्ते यांनी मूळ पुस्तकाचा मराठीत प्रवाही अनुवाद केला आहे.
मोहनलाल भास्कर यांचा जन्म पंजाबमध्ये १९४२ मध्ये झाला. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर ते पाकिस्तानात गेले. तेथे त्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झाली. लाहोरच्या प्रसिद्ध कोट लखपत कारागृहापासून ते मुलतान, मियांवाली अशा वेगवेगळ्या शहरांतील तुरुंगात त्यांना ठेवण्यात आलं. या काळात त्यांच्याकडून माहिती काढून घेण्यासाठी त्यांच्यावर अनन्वित अत्याचार झाले, क्रूर असा छळ झाला. शत्रुदेशात हे अपेक्षितच. मात्र, त्यांना काही सहृदय पाकिस्तानी कैदी, अधिकारी, वॉर्डनही भेटले. या सर्व अनुभवांचे संचित त्यांनी या पुस्तकाद्वारे मांडले आहे. हे एकाच वेळी भयावह, थरारक, कारुण्यजनक अन् क्वचित कधी तरी ओठांवर हलकेसे हसू आणणारे असे झाले आहे. सिमला करारानंतर भारत व पाकिस्तान दरम्यान झालेल्या करारानुसार, दोन्ही देशांतील कैद्यांची देवाणघेवाण करण्यात आली. त्यात मोहनलाल यांची सुटका झाली आणि त्यांना सुदैवानं पुन्हा आपल्या मातृभूमीचं दर्शन घेता आलं. त्या अर्थानं ते सुदैवी ठरले, कारण हेरगिरी करणाऱ्या पाकिस्तानात बहुतांश वेळा मृत्युदंडाचीच शिक्षा झालेली आहे. ती शिक्षा ठोठावली की प्रत्यक्ष शिक्षेची अंमलबजावणी जरी झाली नाही, तरी तेथील तुरुंगात खितपत पडणे हेच नशिबी येते. ते जगणे एवढे खडतर असते, की त्याऐवजी लवकर फाशी झालेली बरी, असेच कैद्यांना वाटू लागते. काही कैद्यांना अटक येथील किल्ल्यात नेऊन ठेवतात. तिथून तर सुटका अशक्यच मानली जाते. मोहनलाल यांनी सुटकेनंतर भारतात कुटुंबीयांसमवेत चांगले जीवन व्यतीत केले. शिक्षकाची नोकरी केली. सन २००४ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
अर्थात हे पुस्तक वाचताना मोहनलाल यांचे हे अनुभव १९६५ ते १९७४ या काळातील, म्हणजे पन्नास वर्षांहून अधिक जुने आहेत, हे लक्षात घ्यावे लागते. दोन्ही देशांची तत्कालीन राजकीय, आर्थिक, सामाजिक स्थितीही लक्षात घ्यावी लागते. तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून केवळ १८ वर्षे झाली होती. दोन्ही देशांतील अनेक लोकांना स्वातंत्र्यपूर्व काळातील एकच असलेला देश चांगलाच स्मरणात होता किंवा तो काळ पाहिलेले अनेक लोक हयात होते. त्यामुळे दोन्ही देशांतील नागरिकांत एकमेकांबाबत जशी कट्टर विरोधाची भावना होती, तशीच ‘आपण एकच आहोत, फाळणीमुळं वेगळे झालेले भाऊ आहोत,’ अशीही भावना अनेक नागरिकांत, विशेषत: दोन भाग झालेल्या पंजाब प्रांतातील नागरिकांत तीव्रतेनं होती. मोहनलाल यांना जे काही चांगले अनुभव आले ते अशा लोकांकडून. बाकी पाकिस्तानातील तत्कालीन लष्करशाही, याह्या खान यांंची क्रूर राजवट, झुल्फिकार अली भुट्टो यांचा उदय, बांगलादेशचे युद्ध आदी सर्व गोष्टी मोहनलाल यांच्या पाकिस्तानी तुरुंगांतील वास्तव्यात घडल्या. या सर्व घटनांकडे ते अतिशय जागरूकपणे पाहत होते आणि त्या घटनांचा आपल्या परीने अन्वयार्थही लावत होते.
भास्कर ज्या कामासाठी पाकिस्तानात गेले होते, त्याविषयी त्यांनी या पुस्तकात काहीही लिहिलेले नाही आणि ते अपेक्षितच आहे. मात्र, पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमाविषयीची माहिती काढायला ते आले होते, असा पाकिस्तानी यंत्रणांचा त्यांना अटक केल्यापासून संशय होता. मोहनलाल यांना अटक झाली तीही अमरिकसिंह नावाच्या भारतीय माणसाच्या डबल एजंटगिरीमुळंच. या अमरिकसिंहचे पाकिस्तानी तुरुंगात पुढं काय हाल झाले हेही मोहनलाल यांनी लिहिलं आहे.
तेथील तुरुंगांत मोहनलाल यांना आलेले अनुभव हाच या पुस्तकाचा गाभा आहे. या अनुभवांविषयी मोहनलाल यांनी सविस्तर आणि तब्येतीत लिहिलं आहे. हे अनुभव वाचताना अनेकदा त्रास होतो. एवढा छळ होत असताना, मोहनलाल यांनी तो कसा काय सहन केला असेल, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. अशा देशभक्ताला आपण मनोमन सलाम करतो. हे सर्व अनुभव मुळातूनच वाचले पाहिजेत. त्यासाठी हे पुस्तक वाचायला हवं.
ऋजुता कर्णिक-गुप्ते यांनी या पुस्तकाचा उत्तम व सुलभ अनुवाद केला आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना एक प्रवाहीपणा जाणवतो.
‘धुरंधर’ चित्रपटानंतर आपल्याकडं पाकिस्तानात जाऊन देशसेवा करणाऱ्या गुप्तहेरांविषयी विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे स्वत:ही पाकिस्तानात काही वर्षे हेर म्हणून काम करत होते. पुण्याचे माजी पोलिस आयुक्त जयंत उमराणीकर हेही पाकिस्तानात काही वर्षे होते. या सर्वांविषयीचा आपला आदर वाढवणारं असं हे पुस्तक चुकवू नये असंच आहे.
---
(लेखक : मोहनलाल भास्कर, अनुवाद : ऋजुता कर्णिक-गुप्ते, रोहन प्रकाशन)
---


