31 Mar 2021

ग्राहकहित दिवाळी अंक २०२० लेख

 ‘श्वासा’ला ग्रहण...

----------------------


यंदाचं हे २०२० हे वर्ष उजाडलं, तेव्हा पुढचं संपूर्ण वर्ष ‘न भूतो न भविष्यति’ अशा एका साथरोगाच्या मुकाबल्यात आपल्याला घालवावं लागणार आहे आणि त्यामुळं संपूर्ण जगात उलथापालथ होणार आहे, असं आपल्याला कुणी सांगितलं असतं, तर विश्वास बसला नसता. पण आता आपण प्रत्यक्षात ही ‘न भूतो...’ अशी अवस्था जगतो आहोत. ‘करोनाव्हायरस डिसीझ १९’ किंवा ‘कोव्हिड १९’ नावाच्या या आजारानं आपलं सगळं जगणंच बदलवून टाकलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांवर त्याचा वेगवेगळा परिणाम झालाय. प्रामुख्यानं चित्रपट, मालिका व नाटक या क्षेत्रांवर त्याचा काय परिणाम झाला व पुढे काय वाढून ठेवलंय, याचा थोडक्यात आढावा या लेखाच्या माध्यमातून घेण्याचा हा प्रयत्न आहे.

करोनाच्या साथरोगाचा चित्रपट, नाटक आणि मालिका या सगळ्यांना सर्वाधिक फटका बसला. या तिन्ही गोष्टी वास्तविक आपल्याला अत्यंत प्रिय! अगदी आपल्या श्वासाइतक्या महत्त्वाच्या! मात्र, करोनामुळं त्याच्यावरच घाव बसला. गर्दीची ठिकाणं टाळायची असल्यामुळं चित्रपटगृहं बंद करावी लागली. नाट्यगृहांचीही तीच अवस्था झाली. मालिकांचं चित्रीकरण बंद पडलं. या तिन्ही क्षेत्रांत काम करणाऱ्या अनेक मंडळींवर बेरोजगार व्हायची वेळ आली. मुंबईसारख्या मायानगरीचं चलनवलन पूर्ण ठप्प झालं. मुंबईत रोज काम करून पैसे मिळविणारी लाखो मंडळी आहेत. हे सगळे, एका फटक्यात काम गेल्यानं, अक्षरश: हतबल झाले. शूटिंगचं काम थंडावलं. चित्रनगरी एकदम शांत झाली. एवढी अवाढव्य, अव्याहत सुरू असलेली मोहनगरी एकदम निपचित झाली. करोनापूर्व काळात मुंबई अशी एकदम बंद होईल, असं कुणी सांगितलं असतं, तर त्यावर कुणीही विश्वास ठेवला नसता. मात्र, करोना या साध्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या छोट्याशा विषाणूनं हा ‘पराक्रम’ करून दाखवला. अर्थात सर्व जगावरच संकट आल्यामुळं कलाकारांनीही धीरानंच घेतलं. काम गेलं असलं, तरी इतर क्षेत्रांतील मंडळींचीही तीच अवस्था होती. त्यामुळं केवळ आपल्याच क्षेत्रावर हे संकट आलंय अशी भावना कुणाच्या मनात आली नाही. लॉकडाउनचा पहिला टप्पा सगळ्या देशानंच अत्यंत काटेकोरपणे पार पाडला. मात्र, हे प्रकरण काही तीन-चार आठवड्यांत संपणारं नाही, हे लवकरच सगळ्यांच्या लक्षात आलं. मात्र, हातावर हात ठेवून तरी किती काळ बसणार? अनेकांनी मग रोजगारासाठी दुसरा मार्ग स्वीकारला. कुणी रिक्षा चालविली, कुणी भाजी विकली, तर कुणी कॅब चालविली! 

मखमली पडदा रुसला...

नाटकासारख्या जिवंत कलेचे या करोनाकाळात सर्वाधिक हाल झाले. समोर प्रेक्षकांच्या जिवंत प्रतिसादावर चालणारी ही रसरशीत कला! मराठी माणसाचं नाट्यवेड नव्यानं सांगायला नकोच. मात्र, एका ठिकाणी गर्दी करायची नाही, या करोनाच्या मूलभूत नियमाचा फार मोठा दणका नाट्य क्षेत्राला बसला आणि नाटकं बंदच झाली. नाट्यप्रयोग बंद पडले आणि पुण्या-मुंबईसह राज्यभरातील मोठमोठी नाट्यगृहं अचानक सुनसान झाली. नाटक हाच श्वास असलेल्या अनेक कलावंतांना गुदमरल्यासारखं झालं. एकीकडे करोना आणि दुसरीकडं ही नाटकबंदी! दोन्हीकडून ‘श्वास’ कोंडू लागला. राज्यात बॅकस्टेजला काम करणारे हजारो कामगार आहेत. त्यांच्यावर त्यांची कुटुंबं अवलंबून आहेत. या कामगारांचे करोनाकाळात मोठे हाल झाले. मात्र, नाट्य परिषद आणि तत्सम संस्थांनी संस्थात्मक, तसेच वैयक्तिक पातळीवर मोठी मदत गोळा केली आणि कृतज्ञतेचा भाव म्हणून या कामगारांना ते पैसे दिले. मात्र, ती मदत तरी किती दिवस पुरणार? नाटक पुन्हा सुरू होणं हेच या कामगारांसाठी आवश्यक ठरलंय. या कामगारांप्रमाणेच छोट्या छोट्या भूमिका करणाऱ्या अनेक कलावंतांचीही अडचण झाली आहे. अनेकांसाठी पैसे तर महत्त्वाचे असतातच; पण रंगभूमीवर सतत वावर असणं हीदेखील काही जणांसाठी नशा असते. मात्र, प्रयोग बंद झाल्यानं अशा कलावंतांची विलक्षण मानसिक कोंडी झालीय.

या काळात काही कलावंतांनी वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. वैभव मांगले हा लोकप्रिय अभिनेता! तो उत्तम गातो, हे आपल्याला माहिती आहेच. पण लॉकडाउनच्या काळात त्याला स्वत:मधील चित्रकाराचा शोध लागला. आपल्या कोकणातील गावी जाऊन वैभवनं झपाटल्यासारखी चित्रं काढली. ती सगळी चित्रं कुठल्याही उत्तम दर्जाच्या चित्रकाराएवढीच उत्कृष्ट होती. तो केवळ चित्रं काढून थांबला नाही, तर त्यानं यातल्या काही चित्रांची विक्री करून ते पैसे बॅकस्टेज कलाकारांच्या मदतीसाठी दिले. वैभवचा हा गुण या काळामुळंच लखलखीतपणे समोर आला. दुसरा एक लोकप्रिय कलाकार हृषीकेश जोशी याने दिग्दर्शित केलेला ‘नेटक’ हा असाच एक प्रयोग होता. यात एक ऑनलाइन नाटक सादर करण्यात आलं. पाच वेगळ्या ठिकाणी असलेल्या पाच अभिनेत्रींनी हे नाटक सादर केलं. या प्रयोगाला अंगभूत मर्यादा होत्या व तंत्रज्ञानावर बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या. मात्र, तरीही नाटकवेड्या रसिकांनी या प्रयोगाचंही उत्स्फूर्त स्वागत केलं. मराठी माणसाचं नाटकवेड यातून लखलखीतपणे समोर आलं. प्रायोगिक नाटकवाल्यांचेही प्रयोग या काळात बंद पडले. पुण्यात सुदर्शन, ज्योत्स्ना भोळे नाट्यगृह या ठिकाणी चालणारे समीप रंगमंचावरचे प्रयोग बंद पडल्यानं नाट्यरसिक हळहळले. हे प्रयोग पुन्हा कधी सुरू होणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. नाटक ही काही जीवनाश्यक बाब नाही, अशी सरकारची बहुतेक समजूत असल्याने करोनाकाळात या कलेकडे, तिच्या पुनरुज्जीवनाकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नसावा. मात्र, माणसाला जगण्यासाठी कलाही तितकीच महत्त्वाची असते; अन्यथा माणसाचं जगणं आणि अन्य जनावरांचं जगणं यात फरक तो काय राहिला? आपल्याकडे नाटकाचं स्थान आपल्या सांस्कृतिक भावविश्वात फार मोठं आहे. मराठी माणूस नाटक केवळ बघत नाही, तर तो ते ‘जगतो’. नाटकातली पात्रं त्याच्या जगण्यातली अविभाज्य भाग होऊन जातात. मग ती गडकऱ्यांची सिंधू असो की पुलंची ‘फुलराणी’; कानेटकरांचा ‘लाल्या’ असो, की तात्यासाहेबांचे ‘अप्पासाहेब बेलवलकर... नटसम्राट’! या सगळ्या व्यक्तिरेखांनी मराठी मनांवर राज्य केलंय. प्रायोगिक नाटकांतून पुढं व्यावसायिक नाटकांत आलेल्या आणि नंतर चित्रपटसृष्टीत गेलेल्या कलावंतांना फार मान मिळतो. याचं कारण तो किंवा ती ‘थिएटर’ करून आलेले आहेत हेच असतं! गेल्या सहा महिन्यांत मराठी माणसाची नाटकं बघायला न मिळाल्यानं जी सांस्कृतिक उपासमार झालीय ती केवळ दुर्दैवी आहे. नाटकाची ती तिसरी घंटा लवकरच वाजो आणि मराठी प्रेक्षकांना त्यांची आवडीची नाटकं नाट्यगृहांत पुन्हा पाहायला मिळोत, एवढंच आपण म्हणू शकतो.

मालिकांचं जग गोठलं...

टीव्हीवर येणाऱ्या दैनंदिन मालिका हाही आपल्या बऱ्याच प्रेक्षकांच्या रोजच्या जगण्याचा अगदी अविभाज्य भाग झाला आहे. करोनाकाळात आलेल्या लॉकडाउननं या मालिकांवरही संक्रांत आणली. शूटिंगच बंद झाल्यामुळं काही दिवसांतच या मालिकांचं प्रक्षेपणही थांबलं. महत्त्वाच्या वाहिन्यांना आपले जुनेच कार्यक्रम पुन्हा दाखवण्याची वेळ आली. मालिकेचा एक भाग साधारणत: चार-पाच दिवस आधी चित्रित करतात. त्यामुळे अचानक लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर अनेकांकडं पुढील दीर्घकाळ पुरतील एवढे मालिकेचे भाग तयार नव्हतेच. मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलावंतांना प्रतिदिन कामाचे पैसे मिळतात. शूटिंग थांबल्यामुळे सगळ्यांचं हे उत्पन्नही थांबलं. लॉकडाउनचा पूर्ण काळ, म्हणजे जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळ मालिकांचं चित्रीकरण बंद होतं. त्यामुळं प्रेक्षकांना हा संपूर्ण काळ जुन्या मालिका किंवा चालू मालिकांचे जुनेच भाग पाहावे लागले आणि दुसरीकडं मालिकेशी संबंधित बहुतेकांचं रोजचं उत्पन्न बुडालं. रोजच्या कामावर पोट अवलंबून असणाऱ्या अनेक कामगारांचे यामुळं अतिशय हाल झाले. अनेकांचं काम गेलं. जूनमध्ये लॉकडाउन हळूहळू शिथिल झाल्यानंतर मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी मिळाली. मात्र, अनेक नियम, अटी, शर्ती व बंधने घालून! एका दृश्यात अधिक व्यक्ती दिसू नयेत याची काळजी घ्यावी लागली. चित्रीकरणाच्या ठिकाणीही मर्यादितच स्टाफला परवानगी देण्यात आली. एखाद्या सेटवर पूर्वी दोन मेकअपमन असतील, तर तिथं आता एकाच मेकअपमनला परवानगी मिळू लागली. स्वाभाविकच एकाचं काम गेलं. असं अनेक बाबतींत झालं. विशेषत: तंत्रज्ञांना मिळणारी कामं घटत गेली.

मधल्या काळात जुन्या लोकप्रिय कार्यक्रमांचा, मालिकांचा रतीब या वाहिन्यांवरून सुरू झाला. नाट्य क्षेत्रात जसे ‘नेटक’सारखे प्रयोग झाले, तसे मालिकांमध्येही काही प्रयोग झाले. ‘सोनी मराठी’वर ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’सारखी संपूर्णपणे घरी चित्रित केलेली मालिका ‘लॉकडाउन स्पेशल’ म्हणून सादर झाली. इतरही काही छोटे-मोठे प्रयोग झाले; पण ते ‘प्रयोग’ या पातळीवरच मर्यादित राहिले. अर्थात, लॉकडाउनच्या काळात बिघडलेल्या मानसिक स्वास्थ्यावर या प्रयोगांची फुंकरही सुखावह ठरली, ही बाब अलाहिदा! 

करोनापूर्व काळात बहुतेक मालिकांचं चित्रिकरण मुंबईतच - गोरेगावच्या चित्रनगरीत - होत असे. करोनानंतरच्या काळात मात्र मुंबईतील निर्बंध पाहून काही निर्मात्यांनी मुंबईबाहेर शूटिंग युनिट हलवलं आणि बाहेर चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. काही जण गुजरातमध्ये गेले, तर काहींनी कोल्हापूर, सातारा परिसरात तळ ठोकला. अशाच एका मालिकेचं सातारा परिसरात चित्रीकरण सुरू असताना तेथे काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांना करोनाचा संसर्ग झाला आणि त्यातच काही दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी सर्वांसाठीच फार धक्कादायक होती. विशेषत: मालिकांचे चित्रीकरण पुन्हा पूर्वीसारखे सुरू होणार, अशा अपेक्षेत असलेल्या इंडस्ट्रीला या बातमीने मोठाच धक्का बसला. यानंतर निर्बंध काही प्रमाणात पुन्हा कडक झाले. आता पुन्हा ही स्थिती पूर्वपदावर येण्यास किती काळ लागेल, हे सांगणं कठीण होऊन बसलं आहे. सुमारे तीन महिन्यांचं उत्पन्न बुडाल्यानं मालिकांचं बजेटही घटविण्यात आलं आहे. बड्या वाहिन्या किंवा निर्माता संस्था पाठीशी असलेल्या मालिकांची फार हानी झालेली नाही; मात्र असा आधार ज्यांच्यापाशी नाही अशा मालिकांचं बजेट कोलमडलं आहे आणि तेथे काम करणाऱ्या सर्वांनाच मोठा आर्थिक फटका बसला आहे, यात वाद नाही. मालिकांचं बजेट घसरल्यानं या इंडस्ट्रीशी संबंधित सर्वच घटकांना आता आर्थिकदृष्ट्या त्याचा फटका बसणार आहे. विशेषत: दिग्दर्शक, लेखक आदी असंघटित मंडळींना याची मोठी झळ बसते आहे. त्या तुलनेत तंत्रज्ञ आदी मंडळी संघटित असल्यानं त्यांच्या हितांचं थोडं फार संरक्षण होण्यात मदत झालेली दिसते. अर्थात एकूणच आर्थिक झळ मात्र या व्यवसायातील सर्वच घटकांना बसली, ही वस्तुस्थिती उरतेच. 

मालिकांमध्ये अनेक लहान-मोठे कलाकार काम करत असतात. मोठा व्याप असतो. विशेषत: मराठीपेक्षाही हिंदी मालिकांचा पसारा व बजेट मोठं असतं. यापैकी बहुतांश मालिकांचं काम मुंबईतच चालत असल्यानं स्थानिक तंत्रज्ञ व कलाकारांना तिथं काम मिळतंच. करोनामुळं या सर्व घटकांवर प्रतिकूल परिणाम झाला. अनेकांचं काम गेलं. याखेरीज मालिकांमध्ये आज केलेल्या कामाचे पैसे तीन महिन्यांनी देण्याची पद्धत आहे. यातही काही ठिकाणी चोख व्यावसायिकता दिसते, तर काही ठिकाणी ढिला कारभार पाहायला मिळतो. त्यामुळं आपले हक्काचे पैसे मिळविण्यासाठी अनेकांना उगाचच रक्त आटवावं लागतं, असा अनुभव आहे. करोनाकाळात तीन महिने पूर्णपणे थांबलेलं काम आणि तीन महिने उशिरा मिळणारे पैसे यांचा एकत्रित परिणाम मोठा आहे. त्यामुळं मालिकांचं चित्रीकरण जून व जुलैत पुन्हा पूर्वीसारखं सुरू झालं, तेव्हा या इंडस्ट्रीतील अनेकांना अगदी हायसं वाटलं. मात्र, बजेट आणि प्रायोजक कमी झाल्यानं पैशांची आवक पूर्वीसारखी राहिलेली नाही, असंही चित्र आहे. ते सुधारायला अर्थातच काही काळ जावा लागेल. त्यानंतर मात्र या मालिका परत पूर्वीसारख्या जोरदार सुरू होतील; याचं कारण या मालिकांचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. मालिकांचं अर्थकारण मोठं आहे. त्यामुळं ही इंडस्ट्री पुन्हा जोमानं सुरू होईल, अशी सर्वांनाच अपेक्षा आहे. प्रायोगिक रंगभूमी किंवा व्यावसायिक रंगभूमीवरून ज्यांना चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर जायचं आहे, अशा बहुतेक लहान-मोठ्या कलाकारांना मधली पायरी म्हणून मालिकांमध्ये काम करण्याचा फायदा होतो. याशिवाय पैसे चांगले मिळत असल्यानं उपजीविकेचा मोठा प्रश्न मिटतो. शिवाय मालिका हिंदीतील आणि चांगला टीआरपी मिळविणारी असेल तर देशभरात, कदाचित जगभरात तुमचा चेहरा प्रेक्षकांच्या ओळखीचा होतो. (अर्थात फक्त चेहराच; कारण अनेक मालिकांमध्ये कलाकाराचं नावच दिलं जात नाही. तो एक वेगळाच मुद्दा आहे. असो.) त्यामुळे मालिकांमध्ये काम करण्यासाठी कलाकारांमध्ये, तर मालिकेचे तांत्रिक काम मिळविण्यासाठी तंत्रज्ञांमध्ये मोठी चुरस असते. या इंडस्ट्रीवरही हजारो लोक अवलंबून आहेत. लॉकडाउनचा फटका मोठा असला, तरी ‘शो मस्ट गो ऑन’ या न्यायाने मालिका पुन्हा एकदा बहरू लागतील, यात शंका नसावी.

रूपेरी पडदा मूक झाला...

करोनाचा सर्वाधिक फटका नाटके व मालिकांसोबतच बसला तो चित्रपटांना! लॉकडाउन सुरू झाल्यानंतर सार्वजनिक वर्दळीची जी ठिकाणे सर्वांत प्रथम बंद झाली त्यात चित्रपटगृहांचा समावेश होता. करोनाचा संसर्गजन्य आजार भीतीदायक वेगाने पसरत असताना मॉल व मल्टिप्लेक्स सुरू राहणार नव्हतेच. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात चित्रपटगृहे बंद राहणार, हे सर्वांनीच मनोमन मान्य केलं होतं. वास्तविक मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दहावीच्या परीक्षा संपल्या. यानंतर येणारा काळ म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी. फिल्म इंडस्ट्रीसाठी वर्षातला सर्वांत मोठा सीझन! नेमका हा सीझन सुरू होतानाच करोनानं घाला घातला आणि चित्रपटगृहांना टाळं लागलं. आता सहा महिन्यांहून अधिक काळ ही फिल्म इंडस्ट्री ठप्प झाली आहे. हिंदी चित्रपटसृष्टी ही जगातील काही बड्या फिल्म इंडस्ट्रींपैकी एक आहे. भारतात दर वर्षी सरासरी दीड ते दोन हजार चित्रपट तयार होतात. त्यांचे वार्षिक उत्पन्न (बॉक्स ऑफिस) साधारण साडेतीन हजार कोटी रुपये एवढं असतं. या इंडस्ट्रीचा एकूण आकार साधारणत: २० हजार कोटी रुपयांचा आहे. त्यातील बहुतांश महसूल आणि उत्पन्न मुंबई शहरातून मिळतं. भारतात साधारणपणे साडेसहा हजार सिंगल स्क्रीन थिएटर आहेत, तर तब्बल २१०० मल्टिप्लेक्स आहेत. या मल्टिप्लेक्समध्ये सरासरी तीन स्क्रीन धरले, तर जवळपास साडेसहा हजार स्क्रीन केवळ मल्टिप्लेक्समध्ये आहेत. देशभरात चित्रपटांचा जो व्यवसाय होतो, त्यातले जवळपास ४५ टक्के उत्पन्न हिंदी चित्रपटांमधून मिळते, तर तेलगू व तमिळ चित्रपट तब्बल ३५ टक्के एवढा वाटा उचलतात. बाकी सर्व भाषांतील चित्रपट मिळून उर्वरित २० टक्के व्यवसाय मिळवतात. या वर्षी मार्च महिन्याच्या मध्यात ही चित्रपटगृहं बंद पडली आणि हे सर्व आर्थिक चक्र ठप्प झालं.

मुंबईत चित्रपटसृष्टीशी निगडित अनेक लहान-मोठे व्यवसाय आहेत. या व्यवसायांची संख्या शंभरहून अधिक आहे. उदा. विग तयार करणारे आणि पुरवणारे लोक किंवा सेटसाठी कपडे शिवणारे व पुरवणारे शिंपी. चित्रपटांसाठी सेट आदी तयार करणारे सुतार किंवा प्लंबर, इलेक्ट्रिशन आणि यासारखे साधारण शंभरहून अधिक व्यवसाय हिंदी चित्रपटसृष्टीशी निगडित आहेत. मुंबईत तर हजारो जण यात काम करतात आणि रोजी-रोटी कमावतात. यातले अनेक जण वर्षानुवर्षं केवळ चित्रपटांसाठीच काम करतात. त्यांना मागणीच एवढी असते, की अन्य कोणासाठी व्यवसाय करण्याची वेळच त्यांच्यावर येत नाही. अशा हजारो लोकांचं उत्पन्न मार्चमध्ये क्षणार्धात थांबलं. एकपडदा चित्रपटगृहांची अवस्था आधीच बिकट होती. करोनानं आता जणू काही त्यांच्या अस्तित्वावरच घाला घातला. आता हे चक्र पुन्हा कधी सुरू होईल; झाले तरी सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये लोक येणार का, असे अनेक मुद्दे आहेत. विशेषत: महानगरांमध्ये मल्टिप्लेक्समध्येच चित्रपट पाहायची सवय लागलेला प्रेक्षक सिंगल स्क्रीन थिएटरकडे पुन्हा येईल की नाही, अशी भीती आहे. याखेरीज मधल्या काळात अनेक प्रेक्षकांना मोबाइलमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमे बघायची सवय लागली आहे. घरबसल्या हवे ते सिनेमे बघण्याची सोय सहज उपलब्ध असताना, ट्रॅफिक जॅममधून मल्टिप्लेक्सला जाणं, तेथील पार्किंगचा प्रश्न, पार्किंगला मोजावे लागणारं अवाजवी शुल्क, मल्टिप्लेक्सला असलेले जादा तिकीटदर, तेथील खाण्याच्या वस्तूंचे असलेले अवास्तव दर या सगळ्यांना कंटाळा येऊन सिनेमाप्रेमी प्रेक्षक स्वत:च्या घरी एकटा आपल्या मोबाइलवर, आपल्या वेळेनुसार, आपल्या आवडीनुसार सिनेमे पाहू शकतो. हा फार मोठा धोका चित्रपटसृष्टीसमोर तयार झाला आहे. यावर पर्याय म्हणून ओटीटीवरही नव्या रिलीज झालेल्या चित्रपटाला वेगळं शुल्क घ्यायचं, अशी संकल्पना समोर येत आहे. तसं झालं, तर लोक पुन्हा त्याही पर्यायाचा विचार करतील. भारतीय प्रेक्षकांची मानसिकता कमी खर्चात (किंवा शक्यतो फुकट) काय मिळेल ते बघण्याची आहे. त्यामुळे मोफत किंवा अगदी माफक किमतीत सेवा देऊ शकणारे बलाढ्य प्लेअर्सच या खेळात टिकतील, यात शंका नाही. 

अर्थात काही बडे चित्रपट असे असतील, की ते मोठ्या पडद्यावर पाहण्याशिवाय पर्यायच असणार नाही. तेव्हा प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहांवर गर्दी करतीलच. पुढील काळात तिकीटदर मात्र वाढलेले असतील, हे सांगायला नकोच. त्यामुळे थिएटरमध्ये जाणं किंवा न जाणं ही पुन्हा प्रेक्षकांसाठी निवडीची संधी देणारी बाब असेल. सिंगल स्क्रीनमधला दंगा, पिटातलं ते वातावरण हे मात्र आता कदाचित ग्रामीण किंवा निमशहरी भागांतच बघायला मिळेल.

नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही गोष्टी वरकरणी जीवनावश्यक नसल्या, तरी आपण फार काळ त्यापासून दूर राहू शकत नाही. तसं झालं तर आपलं सांस्कृतिक संचित आटत जातं, हे आपल्या लक्षात येईल. आपल्याला जगण्यासाठी केवळ निरोगी श्वासच लागतो, असं नाही तर आपलं सांस्कृतिक भरणपोषण करणाऱ्या ललितकलाही लागतात. त्यांच्या आस्वादनाने आपण माणूस म्हणून जगण्याची एक वेगळी पातळी गाठू शकतो. आपल्या साध्याशा आयुष्यात विलक्षण आनंद निर्माण करण्याची ताकद या कलांमध्ये आहे. त्यामुळं त्या लवकरात लवकर पूर्ववत सुरू होवोत आणि आपल्याला पूर्वीप्रमाणेच त्याचा भरभरून आनंद लुटायला मिळो, अशीच प्रत्येक रसिकाची इच्छा आहे.

----

(पूर्वप्रसिद्धी : ग्राहकहित दिवाळी अंक, २०२०)

----


26 Mar 2021

मटा लॉकडाउन वर्षपूर्ती लेख

अज्ञाताच्या वळणावर...

----------------------------



आपल्या देशात लॉकडाउन सुरू झाला, त्याला आज (२५ मार्च) बरोबर एक वर्ष पूर्ण झालं. ‘कोव्हिड-१९’ किंवा करोना नावाच्या विषाणूनं आपल्या जगण्यात प्रवेश करून सगळा खेळच बिघडवून टाकला. या एका वर्षात आपल्या आयुष्यात ‘न भूतो...’ असे बदल घडून आले. ‘...न भविष्यति’ असं मुद्दाम म्हटलं नाही, कारण भविष्याच्या पोटात काय वाढून ठेवलं आहे, हे आपल्याला माहिती नाही. त्या अर्थानं एका अज्ञाताच्या वळणावर आपण सारे उभे आहोत. संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वाला मुळापासून हादरे देणाऱ्या ज्या काही गोष्टी हजारो वर्षांपासून घडत आल्या आहेत, त्यातली ही एक असू शकेल का, हेही आपल्याला माहिती नाही. तसं असेल तर मात्र आपण आपल्या मानवजमातीच्या इतिहासातल्या एका महत्त्वाच्या टप्प्याचे साक्षीदार आपोआपच होत आहोत. आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या उलथापालथीकडे या व्यापक परिप्रेक्ष्यातून पाहिलं, तर सगळं जगणं कवेत घेणं कदाचित सुलभ होऊ शकेल. आपल्या जगण्याचा फेरविचार करता येईल. आपल्या गरजांकडे, वाढीकडे, अपेक्षांकडे आणि आकांक्षांकडे नव्याने पाहता येईल.

गेल्या वर्षी करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनचा, अर्थात टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयाच्या योग्यायोग्यतेची चर्चा होत राहील. मात्र, त्या वेळी हे संकट सर्वांसाठीच नवीन असल्याने जे जे उपाय केले गेले, ते ‘हे करून तर पाहू’ अशा दृष्टीनेच केले गेले. व्यापक जनहितासाठी काही गैरसोयी सहन करण्याची तयारी सर्वांनीच ठेवली. मात्र, अशा प्रकारची परिस्थिती जगाने यापूर्वी कधीही अनुभवली नसल्याने, अशा निर्णयांतून येणारी अपरिहार्य होरपळ बऱ्याच मोठ्या जनसमुदायाच्या वाट्याला आली. या सगळ्यांतून ज्यांच्या जगण्यावर काहीच प्रतिकूल परिणाम झाला नाही, असे फारच थोडे. ते भाग्यवान! मात्र, बहुसंख्यांना या ना त्या प्रकारे या भीषण संकटाची झळ बसली. ‘आयुष्यात सगळं काही सुरळीतच चालणार आहे,’ या आपल्या मनात नकळत तयार झालेल्या गृहीतकालाच धक्का बसला. त्याची जागा ‘आज, आत्ता, उद्या काहीही होऊ शकतं’ या भावनेने घेतली. अशी भावना सातत्याने मनात राहणं म्हणजे दीर्घकाळाच्या नैराश्याला आश्रय! गेल्या वर्षभरात जगभरात अनेकांना अशा नैराश्याचा सामना करावा लागला. रोजीरोटीचं साधन हरपल्यामुळं खूप जणांना सैरभैर व्हायला झालं. करोनामुळं आपल्या जवळच्या आप्तांचा थेट मृत्यूच बघावा लागलेल्यांच्या दु:खाची तर गणनाच नाही. सर्वांत जास्त हाल तर हातावर पोट असलेल्या लाखो श्रमिकांचे झाले.

लॉकडाउननंतर भारतातलं फाळणीनंतरचं कदाचित सर्वांत मोठं असं स्थलांतर घडून आलं. मनात इच्छा नसताना करावं लागणारं स्थलांतर वेदनादायक असतं. भारतातल्या मोठ्या महानगरांमधून असे अनेक अभागी जीव आपापल्या गावांकडं निघाले. रस्ते बंद होते, वाहने नव्हती. अशा वेळी अगदी दुचाकी गाड्यांवरून, सायकलवरून आणि ज्यांच्याकडे ही वाहनेही नव्हती ते तर चालत चालत हजारो किलोमीटर दूर असलेल्या आपल्या गावांकडे निघाले. या स्थलांतराची वृत्तवाहिन्यांवरून पाहिलेली दृश्ये काळजाला पीळ पाडणारी होती. ज्या शहरांवर आपण अवलंबून होतो, त्यांनी अचानक आपल्याला दूर लोटल्याने एक प्रकारे अनाथ झाल्याची भावना या श्रमिकांच्या चेहऱ्यावर दाटली होती. सगळेच जण संकटात होते. एरवी मदतीला धावून येणाऱ्या हातांनाही इथे मागे सरावे लागले होते. तरीही अनेक स्वयंसेवी संस्थांनी, माणसांनी आपल्यातली माणुसकी शाबूत असल्याचे दाखवून, या श्रमिकांना होता होईल ती मदत केली. मात्र, ती फारच अपुरी होती. स्थलांतरितांच्या वेदनांना अंत नव्हता. 



शहरांमध्ये जे राहिले आणि ज्यांना रोजीरोटी उपलब्ध होती, त्यांचेही हाल सुरूच होते. लहान हॉटेल चालविणारे, छोट्या खाणावळी किंवा मेस चालविणारे, केशकर्तनालय चालविणारे, पर्यटन व्यावसायिक, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे अशा अनेकांचे धंदे या लॉकडाउनमुळं बंद पडले. अनेकांना रोजच्या जेवणासाठी दुसऱ्यांकडे मदतीचा हात पसरावा लागला. अनेकांनी नवे उद्योग-व्यवसाय सुरू केले. केस कापणाऱ्या कारागिरांनी रस्त्यावर बसून कलिंगड विकले. कुणी घरोघरी अन्नपदार्थ पोचविण्याचे काम सुरू केले. ज्याला जसे जमेल तसे त्याने हात-पाय हलवले आणि जीव तगविला. प्रत्येक प्राणिमात्रांत ‘सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट’ असतंच. मनुष्यप्राणी सर्वांत हुशार; त्यामुळे त्याच्यात तर ते असतंच. त्यामुळं आपण सगळेच तगून राहिलो. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी मागच्या वर्षी ‘हे वर्ष फक्त तगून राहण्याचे आहे,’ असे रास्तपणे म्हटले होते, ते त्यामुळेच! अर्थात आपल्या जगण्याच्या गुणवत्तेवर त्याचा मोठा परिणाम झाला. अनेकांच्या धारणा बदलल्या, अनेकांच्या मूल्यव्यवस्थेला तडे गेले, अनेकांना आपले प्राधान्यक्रम तपासून पाहावेसे वाटले, तर अनेक नातेसंबंधांत वितुष्ट आले किंवा दुरावा तरी आला. दुसरीकडे, संकटांमुळे माणूस जोडलाही गेला. सामान्य माणसातले असामान्यत्व कित्येकदा दिसून आले. जिथे आपले दूर गेले, तिथे ओळखपाळख नसलेलेही मदतीला धावून आले. प्लाझ्मादान करण्यापासून ते करोना झालेल्या कुटुंबीयांना अन्नधान्य पोचविण्यापर्यंत अनेक हात मदतीसाठी पुढे आले. जगण्यावरची श्रद्धा दृढ व्हावी, असे क्षण अनेकांच्या वाट्याला आले. विशेषत: डॉक्टर, नर्स, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी यांना हे क्षण अधिक लाभले. त्यांच्या अविश्रांत कष्टांमुळे कित्येक जीव जगले, वाचले! 

मध्यमवर्गीय घरांमध्ये अनेकांना पूर्वीचे दिवस पुन्हा जगता आले. सर्व कुटुंब संध्याकाळच्या जेवणासाठी एकत्र आले आहे, हे दृश्यही अनेक घरांत दिसून आले. ‘वर्क फ्रॉम होम’ हा नव्या जगण्याचा मंत्र झाला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात (मूळ अभ्यासक्रमात नसलेला) ‘ऑनलाइन शिक्षण’ नावाचा नवाच धडा आला. विद्यार्थ्यांसोबतच पालकांची आणि शिक्षकांचीही कसोटी या काळाने बघितली. ती ‘परीक्षा’ अजूनही सुरू आहे आणि कदाचित आता नव्या जगण्याचा तो अविभाज्य भागच असू शकेल. माणसाला माणसाची सोबत किती महत्त्वाची आहे, हे या काळात बहुतेकांना नव्याने उमगलं. लॉकडाउनमुळे आपली अतिवेगवान जीवनशैली एकदम थांबल्याने अनेकांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा झाला. कामासाठी दूर अंतरापर्यंत प्रवास करून जाण्याचे कष्ट टळले. त्यामुळे अनेकांची तब्येत सुधारली. अनेकांनी घरकामांत मदत करायला सुरुवात केली. आपल्या  धावपळीच्या, ताणाच्या जगण्यात आपण काय गमावत होतो, हेही अनेकांना कळून चुकलं.

आज लॉकडाउनला एक वर्ष पूर्ण होत असताना, दुर्दैवाने आपण पुन्हा गेल्या वर्षी जिथं होतो तिथंच उभे आहोत. साथीने पुन्हा नव्याने तोंड वर काढले आहे. लसी आल्या असल्या तरी सर्वांना लस मिळेपर्यंत बराच काळ जाईल. त्यामुळे ही साथ आणि ही सगळी बंधनं किती काळ पुढं चालणार आहेत, हे कुणीच सांगू शकत नाही. आपण गेल्या वर्षी या साथीला जेवढं गांभीर्यानं घेतलं, तेवढं आता घेत नाही आहोत, हे स्पष्टच दिसतं आहे. याचे परिणाम काय होणार आहेत, हे सांगता येत नाही. अज्ञाताच्या या वळणावर, सगळं काही अनिश्चित, धूसर दिसत असताना एक गोष्ट मात्र शाश्वत आहे - माणसाचं जगण्यावरचं चिवट प्रेम! आपल्याला जगायचं आहे आणि चांगल्या दर्जाचं आयुष्य जगायचं आहे, ही माणसाची मूलभूत प्रेरणाच त्याला या संकटातून तारून नेईल, हे नक्की!

---


(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; २५ मार्च २०२१)

---

गेल्या वर्षी लिहिलेला लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा...

----

28 Feb 2021

दृष्टी-श्रुती डिजिटल दिवाळी अंक लेख २०२०

नवी दृष्टी देणारा ‘राशोमान’

---------------------------------


काही वर्षांपूर्वी मी पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आयोजित केलं जाणारं (आणि महत्त्वाचं म्हणजे मराठीतून चालणारं) एक आठवड्याचं रसास्वाद शिबिर अटेंड केलं होतं. माझ्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा व मोलाचा अनुभव होता. त्यातही या शिबिरात आम्हाला दाखवला गेलेला अकिरा कुरोसावाचा ‘राशोमान’ हा चित्रपट पाहून मी थरारून गेलो. तब्बल ७० वर्षांपूर्वी निघालेला हा सिनेमा मी आठ वर्षांपूर्वी प्रथम पाहिला. त्यानंतर अनेकदा पाहिला. दर वेळी मला या चित्रपटानं वेगळी अनुभूती दिली आहे; माझ्या धारणा बदलल्या आहेत. ‘सत्य म्हणजे काय?’, ‘जगात एकच एक सत्य असतं का?’, ‘ज्याला जसं दिसतं तसं सत्य असतं का?’ या आणि अशा अनेक मूलभूत प्रश्नांना हात घालणारा हा चित्रपट म्हणूनच माझ्या मनावर खोलवर ठसा उमटवून गेला आहे.
त्यामुळंच १९५० मध्ये प्रदर्शित झालेला ‘राशोमान’ (याचे उच्चार राशोमोन, राशोमन असेही केले जातात!) हा चित्रपट जागतिक अभिजात चित्रपटांमध्ये गणला जातो. मानवी जीवनावर, वर्तनावर मूलभूत चिंतन करणारे चित्रपट नेहमीच कलात्मक आणि वैचारिक उंची गाठताना दिसतात. ‘राशोमान’ हा याच वर्गातला चित्रपट. रायुनोसुक अकुतागावा यांच्या ‘राशोमान’ याच नावाच्या लघुकथेवरून या चित्रपटाचं शीर्षक घेण्यात आलं असलं, तरी प्रत्यक्षात अकुतागावा यांच्यात ‘इन ए ग्रोव्ह’ या दुसऱ्या लघुकथेवर आधारित या चित्रपटाचं कथानक रचण्यात आलं आहे.

जपानमधील ग्रामीण भागात असलेल्या 'राशोमान' या भग्नावस्थेत असलेल्या, भव्य लाकडी प्रवेशद्वाराच्या दृश्यानं चित्रपटाची सुरुवात होते. दर वेळी हा सिनेमा सुरू झाला की हे दृश्य आणि त्या वेळी कोसळत असलेला भयंकर पाऊस आपलं लक्ष वेधून घेतात. आपण अगदी सावरून पुढं काय होणार ते बघू लागतो. या लाकडी प्रवेशद्वाराच्या खाली असलेल्या जागेत एक लाकूडतोड्या आणि एक तरुण धर्मगुरू बसलेला आहे. त्या दोघांनीही तीन दिवसांपूर्वी एक भयानक घटना बघितली आहे. प्रचंड पाऊस कोसळत असल्यामुळं आणखी एक माणूस तिथं आश्रयाला येतो. हे दोघं मग त्या माणसाला त्या घटनेविषयी सांगतात. ती घटना असते जंगलात झालेल्या एका खुनाची. त्या लाकूडतोड्यानं एका माणसाच्या मृतदेहाचे हात बघितलेले असतात. त्यानंतर तो घाबरून तिथून पळून जातो. नंतर त्या खुनाचा खटला सुरू होतो, तेव्हा कोर्टासमोर सगळी हकीकत आपल्यासमोर उलगडत जाते. त्या दिवशी जंगलात घोड्यावरून एक सुंदर तरुणी आणि सोबत चालत तिचा सैनिक (समुराई) पती जात असताना ‘ताजोमारू’ नावाचा त्या भागातला कुख्यात दरोडेखोर त्यांना पाहतो. त्याच वेळी किंचित वारा येतो आणि त्या तरुणीच्या चेहऱ्यावरील पडदा हलतो. तेव्हा तिच्या अप्रतिम सौंदर्याचं दर्शन त्या दरोडेखोराला होतं. त्याच्या मनात तिच्याविषयी अभिलाषा उत्पन्न होते. त्यानंतर जे काही घडतं, त्याची तीन वेगवेगळी रूपं तिथल्या आपल्याला पाहायला मिळतात. दरोडेखोराचं, त्या तरुणीचं आणि मृत सैनिकाचं... (मृत सैनिकाचं म्हणणं प्लँचेटद्वारे ऐकायला मिळतं.) हे तिघेही कोर्टासमोर आपला जबाब देत असतात. या तिघांचंही म्हणणं ऐकल्यावर लाकूडतोड्या स्वतःचं चौथं (आणि आधीच्या तीन कहाण्यांपेक्षा वेगळंच) म्हणणं सांगतो. हे पाहिल्यावर नक्की काय घडलं, याविषयी आपल्याही मनात संभ्रम उत्पन्न होतो. सत्य नक्की काय, याविषयी आपण विचार करू लागतो. चित्रपटाच्या शेवटाकडं दिग्दर्शक याचं सकारात्मक उत्तर देतो. चित्रपट संपल्यानंतरही आपण त्या कथानकात आणि महत्त्वाचं म्हणजे दिग्दर्शकानं उपस्थित केलेल्या मूलभूत प्रश्नाचं चिंतन करण्यात गुंग होऊन जातो, हे या कलाकृतीचं सर्वांत मोठं यश!
मी हा सिनेमा पाहिल्यानंतर आपल्यावर असा, एवढा खोलवर परिणाम याआधी कुठल्या चित्रपटानं केला आहे, हे आठवू लागलो. ‘संत तुकाराम’पासून ते ‘वास्तुपुरुष’पर्यंत आणि ‘पथेर पांचाली’पासून ‘गँग्ज ऑफ वासेपूर’पर्यंत अनेक चित्रपट डोळ्यांसमोरून गेले. जागतिक चित्रपट महोत्सवांत मी यापूर्वीही अनेक परकीय भाषांतले चित्रपट पाहिले होते. मात्र, एवढा खोल परिणाम अन्य कुठल्याही चित्रपटाचा माझ्यावर झालेला मला आठवत नाही. ‘राशोमान’नंतर मात्र माझी विचारांची दिशाच बदलून गेली. मानवी आयुष्याकडं, जगण्याकडं बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन मला या कलाकृतीनं दिला.
याबाबत अधिक विचार केल्यावर लक्षात येतं, की या विचारांचं मूळ त्या कलाकृतीतच दडलेलं आहे. कुरोसावा यांनी या चित्रपटाची मांडणी मोठी वेधक केली आहे. चित्रपट माध्यमाची ताकद त्यातून लक्षात येते. चित्रपटाचं पार्श्वसंगीत अप्रतिम आहे. किंबहुना संपूर्ण चित्रपटात या पार्श्वसंगीतानं एखाद्या पात्रासारखी भूमिका बजावली आहे. चित्रपट जुन्या काळातला आणि कृष्णधवल असला, तरी 'राशोमान' गेटवर प्रचंड कोसळणारा पाऊस आणि तिथं बसलेली तीन माणसं हे दृश्य अंगावर काटा आणतं. चित्रपटाची सुरुवात आणि शेवट वेधक आहे. सुरुवातीला भरून आलेलं आभाळ आणि कोसळणारा पाऊस, तर शेवटच्या दृश्यात मोकळं झालेलं आकाश आणि स्वच्छ पडलेलं ऊन हे अगदीच प्रतीकात्मक आणि सहज लक्षात येण्यासारखं आहे.
या चित्रपटात तोशिरो मिफुने या प्रख्यात जपानी अभिनेत्यानं ताजोमारू या दरोडेखोराची भूमिका केली आहे. मिफुने यांनी कुरोसावा यांच्या एकूण १६ चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. त्यापैकी ही दरोडेखोराची भूमिका खास समजली जाते. याशिवाय तकाशी शिमुरा यांनी लाकूडतोड्याची, मिनोरू चिआकी यांनी तरुण धर्मगुरूची, तर माचिको क्यो हिनं तरुणीची भूमिका केली आहे. या सर्वांनी आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत. चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असताना यापैकी कुणाही कलाकाराला चित्रपटाचा शेवट काय आहे, हे माहिती नव्हतं, म्हणे! त्यामुळे ते कुरोसावा यांच्याकडं चित्रपटाचा शेवट सांगण्यासाठी हट्ट करीत असत. चित्रपट तयार झाल्यानंतर कुरोसावा यांना एकच एक असं सत्य सांगायचंच नव्हतं; तर सत्य नावाची गोष्ट मुळात अस्तित्वात आहे का; की ती व्यक्तिपरत्वे बदलते, याच मुद्द्यावर लक्ष वेधायचं होतं, हे सर्वांच्या लक्षात आलं.
या चित्रपटाचं महत्त्व म्हणजे या चित्रपटामुळेच जपानी चित्रपट जागतिक स्तरावर पोचला. या चित्रपटाने व्हेनिस चित्रपट महोत्सवात (१९५१) प्रतिष्ठेचा गोल्डन लायन पुरस्कार पटकावला. याशिवाय १९५२ च्या ऑस्कर सोहळ्यात या चित्रपटाला अॅकॅडमी ऑनररी पुरस्कारानं गौरविण्यात आलं. मुळात हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा जपानमध्ये त्याचं फार काही जोरदार स्वागत झालं नव्हतं. किंबहुना काही टीकाकारांनी या चित्रपटावर टीकाच केली होती. मात्र, अमेरिकेत व पाश्चात्त्य जगात या चित्रपटाचे कौतुक झाल्यावर जपानमधील समीक्षकही गोंधळले होते. हा चित्रपट म्हणजे दुसऱ्या महायुद्धात जपानच्या झालेला पराभवाचं समर्थन करण्याच्या मानसिकतेतून आलेली कलाकृती आहे, असाही काही समीक्षकांनी या चित्रपटाचा अर्थ लावला होता. अर्थात सत्याचा शाश्वत शोध हाच हा सिनेमाचा मूलाधार असल्यानं तो जगभरातल्या प्रेक्षकांना आवडला आणि आज तो जगातील काही सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो.

मला स्वत:ला हा चित्रपट याच कारणासाठी भावला, आवडला, पटला! हा चित्रपट पहिल्यांदा पाहणारा माणूस ‘सत्य’ या संकल्पनेविषयी आपल्या मनात चित्रपट पाहण्यापूर्वी असलेल्या धारणा नक्कीच तपासून बघितल्याशिवाय राहणार नाही, याची मला अगदी खात्री वाटते. ‘सत्यमेव जयते’ हे आपलं राष्ट्रीय वचन आहे. अगदी लहानपणापासून आपल्याला नेहमी खरं बोलावं, खरं वागावं अशी शिकवण दिली जाते. पण हे खरं म्हणजे काय, सत्य म्हणजे नक्की काय, याचा उलगडा काही होत नाही. आयुष्यात पुढं आपण मोठे झालो, टक्केटोणपे खाऊन शहाणे झालो, तरी या विचाराचा पिच्छा काही सुटत नाही. जसजसे आपण मोठे होत जातो, आपलं अनुभवविश्व समृद्ध होत जातं तसतसं सत्य नावाच्या ‘साक्षात्कारा’ची वेगवेगळी ओळख पटू लागते. त्यातून संभ्रम वाढतच जातो. एकच घटना दोन वेगळ्या ठिकाणांहून बघणाऱ्या लोकांना वेगळी दिसते. त्यांना जे दिसतं, तेच त्यांच्यापुरतं सत्य असतं. असं असेल तर मग एकच एक, शाश्वत असं सत्य असतं तरी काय? आपली जडणघडण, आपल्या विचारांची बैठक, धारणांचा पाया नक्की कुठल्या गृहीतकांवर आधारित आहे? मग जर हा पायाच ठिसूळ असेल तर त्यावर आधारलेली सगळी नीतिमूल्यं झूठ ठरवायची का? की मुळात हे सगळे मनाचे खेळ आहेत? आपल्या कृत्यांचं समर्थन करण्यासाठी माणसाचा अत्यंत हुशार मेंदू तर या वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधून काढत नाही ना? याला हे म्हणायचं, त्याला ते म्हणायचं हे सगळं ठरवलं कुणी? आदिम प्रेरणांपासूनचा हा प्रवास नक्की कुठल्या घटकांवर आधारलेला आहे? संस्कृती म्हणजे तरी नक्की काय? आदिम प्रेरणांचं नियमन करणाऱ्या या चौकटी मोडण्यासाठी तर मानवी मनाचे हे निरनिराळे खेळ सुरू नाहीत ना? आपण जे काही वागतो, बोलतो त्याला एक प्रामाणिकपणाचं, सत्याचं कथित अधिष्ठान दिलं, की मग माणूस मोकळा होतो. त्याला या कृत्यांविषयी लाज वाटत नाही, की पश्चात्ताप होत नाही. पण मग स्वत:च्या मनालाही फसवू शकेल अशी कुठली ‘सत्य’ नावाची बाब अस्तित्वात तरी असू शकते काय? एक ना दोन... अशा नाना प्रश्नांनी मन भोवंडून जातं. ‘राशोमान’मधली कथा आणि त्यातल्या पात्रांचं वर्तन पाहून सतत हेच विचार मनात पिंगा घालायला लागतात.
मग लक्षात येतं, की दिग्दर्शकानं या सर्व कथेतून हाच मूलभूत विचार उपस्थित केला आहे. तो वाचून आपले सत्य या संकल्पनेविषयीचे सर्व पूर्वग्रह गळून पडतात आणि आपण तिचा नव्यानं विचार करायला लागतो. माझ्या मते, एखाद्या कलाकृतीचं हे यश फार मोठं मानायला हवं. कलाकृतीचा आस्वाद घेताना ती केवळ पंचेद्रियांना सुखावणारी न राहता, मेंदूपर्यंत घुसून तिथल्या विचार केंद्रांना चालना देत असेल, तर ती कलाकृती निखालस मोठी! ‘राशोमान’ ही अशीच कलाकृती आहे. हा सिनेमा पुन:पुन्हा बघताना त्यातले अर्थ नव्यानं उलगडत जातात. आपलं वय वाढतं, आपली विचारक्षमता वाढते, अनुभवविश्व वाढतं, तसं या कलाकृतीचा आवाकाही नव्यानं समजू लागतो. तब्बल ७० वर्षांपूर्वी तयार झालेला हा कृष्णधवल चित्रपट आपल्याला अजूनही नवनवे विचार देत आहे, आपल्या धारणांना धक्का लावतो आहे. त्या अर्थानं आता ‘राशोमान’चा आयुष्यावर पडलेला कायमस्वरूपी प्रभाव हेही एक निखळ ‘सत्य’च आहे! 

----

(पूर्वप्रसिद्धी : दृष्टी-श्रुती डिजिटल दिवाळी अंक २०२०)

---

22 Feb 2021

समदा दिवाळी अंक २०२० लेख

 अन्नपूर्णा आणि अन्नपूर्णा २.०

-----------------------------------

आमचं गावाकडचं जुनं धाब्याचं घर आहे... सलग सात खणांचं... त्यातल्या एका कोपऱ्यात स्वयंपाकघराचा उंचवटा आहे... त्या उंचवट्याच्या कोपऱ्यात चूल आणि वैल आहे. चूल धडाडून पेटली आहे. त्यावर तापलेला तवा आहे. मी त्या उंचवट्याच्या खाली ताट समोर घेऊन बसलो आहे. माझी आजी त्या चुलीशेजारी हातात फुंकणी घेऊन चुलीत फूंक मारते आहे. चुलीतल्या धुरामुळं तिचे डोळे तर चुरचुरताहेतच, पण मलाही एवढ्या लांब ती धग लागते आहे... पण पोटातली भुकेची धग त्याहून मोठी आहे... म्हणून मी दटून तिथंच बसलो आहे... मग तव्यावरची गरमागरम भाकरी पुढच्या मिनिटाला माझ्या ताटात येते आहे आणि ताटातल्या ताकातल्या पिठल्यासोबत मी ती पेढ्यासारखी अत्यंत रुचकर भाकरी खातो आहे...

आजी आणि आईच्या हातचं जेवण हा विषय प्रत्येकालाच प्रिय असा! आपला शब्दश: पिंड ज्यावर पोसला आहे असं हे खाण्याचं नातं... या दोघींशी जसा आपला रक्ताचा संबंध असतो, तसा आणि तितकाच लहान आतड्याचा, मोठ्या आतड्याचा, जठराचा, यकृताचा, अन्ननलिकेचा, स्वादुपिंडाचा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे जिभेचाही संबंध असतो. शेतात पडलेलं बीज आणि त्यातून वर आलेल्या धान्याच्या कोंभाइतकंच हे नातं जैव असतं... त्यामुळंच बालपणीच्या या दोघींशी संबंधित सगळ्या आठवणी त्यांच्या हातून खाल्लेल्या पदार्थांच्याच जास्त आहेत. बायकोच्या हातच्या पदार्थांना आईच्या हातची चव येत नाही आणि आईच्या हाताला ती चव यायला आजीच्या हाताखाली अनेक वर्षं उमेदवारी करावी लागते, असं आपल्याकडं म्हणतात त्यामागं हेच कारण असावं. वर्षानुवर्षं हाताला चटके सोसत या माउल्यांनी आपल्या जिभेचे चोचले पुरवले. त्याची सर आता कशाला येणं शक्य नाही...

आमच्या आजीचं नाव काशीबाई. ती माहेरची देशमुख. जामखेडच्या गढीवरच्या देशमुखांचं तालेवार माहेर. त्यामुळं तिच्या अंगात तो ‘देशमुखी’ तोरा शेवटपर्यंत होता. आमचं गाव तसं दुष्काळी! बऱ्याच गोष्टींचा अभाव... पण या जामखेडच्या मातीत ज्वारी उत्कृष्ट दर्जाची पिकते. आमच्या शेतातून घरी ज्वारी यायची आणि आमच्या बाहेरच्या घरात निम्म्या भागात पोती ओतली जायची. शेजारी आधाराला उरलेली पोती लावली जायची. आम्ही भावंडं त्या पोत्यावर चढून त्या ज्वारीत उड्या मारायचो. ज्वारीत खेळून खेळून पाय पांढरेफटक व्हायचे. ‘अन्नधान्याने घर भरू दे,’ ही म्हण आमच्या घरात शब्दश: मूर्त व्हायची. अर्थात ज्वारी घरातली खूप असली, तरी आमच्या रोजच्या जेवणात भाकरी नसायची. पोळी, भाजी, कोशिंबिरी, चटण्या, भात आणि वरण असाच सर्वसाधारण घरांत असतो, तसा रोजचा मेनू असायचा. 

आमच्या आजीमधली सुगरण खऱ्या अर्थानं दिसायची ती सणावाराला. तेव्हा तिचा कडक सोवळ्यात स्वयंपाक असायचा. होळी, श्रावणातले चारही शुक्रवार, पोळा, नवरात्र, दसरा, खंडोबाचं नवरात्र हे प्रमुख सण घरात साजरे व्हायचे. त्यात दोन्ही नवरात्रांत आणि श्रावणात कुळधर्म, कुळाचार चाले. श्रावणातल्या चारही शुक्रवारी घरात पुरणावरणाचा ज्याचा ‘चारी ठाव’ म्हणतात तसा स्वयंपाक असायचा. माझी आजी तिच्या साठीपर्यंत सगळा स्वयंपाक एकहाती करायची. नंतर सुना आल्यावर तिनं फक्त पुरणपोळ्यांचं काम स्वत:कडं घेतलं आणि बाकी स्वयंपाक माझी आई व काकू मिळून करू लागल्या. ती सवाष्ण बारा वाजता जेवायला यायच्या आत हा सगळा स्वयंपाक तयार असायचा. त्यासाठी या बायका पहाटेच उठून कामाला लागायच्या. पुरणाचा घाट मोठा असायचा. मी जरा मोठा झाल्यावर कधी कधी पुरणयंत्रांतून पुरण हाटण्याचं काम मला मिळे. पण हे खूप नंतर! त्यापूर्वी आजी पाटा-वरवंट्यावरच पुरण घालत असे. मात्र, आजीची पुरणपोळी कमाल असायची. अगदी रेशमासारखी नाजूक, नेमकी गोड आणि अजिबात पुरण बाहेर न सांडणारी अशी बांधीव पोळी आजी करायची. तांबूस, लालसर रंगाची ती पोळी वरून साजूक तूप घातल्यावर आणखीनच देखणी दिसायची. तिचा पहिला घास तोंडात गेला, की चटका बसायचाच. पण तो चटका सोसत सोसत ती पोळी घशाखाली उतरवण्याच्या आनंदाला ‘स्वर्गीय’ एवढा एकच शब्द मला सुचतो. खरं सांगायचं, तर त्या लहान वयात या अन्नपदार्थांचं मोल आम्हाला कितपत कळलं होतं कोण जाणे. तो दर्जा आम्ही जणू गृहीतच धरला होता. नंतर आयुष्यात घराबाहेर पडायची, होस्टेलवर राहण्याची, मेसमधला गार डबा खाण्याची वेळ आली, तेव्हा डोळे खाडकन उघडले. आजी आपल्याला काय उत्तम दर्जाचं जेवण करून खायला घालत होती, हे समजलं. आजीसारखीच तिची मोठी मुलगी, म्हणजे माझी थोरली आत्या सुगरण होती. अक्षरश: अन्नपूर्णाच ती! तिच्या हाताला जी चव होती, त्याचं वर्णन करणं अशक्य आहे. कुठलाही पदार्थ सांगा, तिला तो जमत नाही किंवा तिचा तो बिघडलाय, हे मी कधीच पाहिलेलं नाही. या माझ्या आत्यानंही आमच्या जिभेचे भरपूर चोचले पुरवले. वास्तविक पुरणपोळी खावी तर माझ्या आजीच्या हातचीच! (हे प्रत्येक जण म्हणत असतो, हे मला ठाऊक आहे आणि ते प्रत्येकाच्या बाबतीत तेवढंच खरं आहे. याचं कारण आपल्यावर लहानपणी त्या खाण्याचा झालेला संस्कार!) पण खरोखरच आमच्या आजीची पुरणपोळी रेशमासारखी असायची. त्या काळातल्या बहुतेक बायका अशाच सुगरण असायच्या. पण प्रत्येकीच्या हातची चव वेगळी! आमच्या आत्यानं तिच्या आईचा हा गुण केवळ उचललाच होता असं नाही तर तिनं त्या गुणाचा भरपूर विस्तारही केला. माझे आजी-आजोबा शिरूरला अनेक वर्षं राहिले. आत्या ही त्यांची सर्वांत थोरली मुलगी. तिचं लग्न पुण्यात मकाशीर कुटुंबात झालं आणि ती पुणेकर झाली. आधी कसबा गणपतीजवळ आणि नंतर साततोटी हौदाजवळ फुलंब्रीकर वाड्यात तिनं अनेक वर्षं संसार केला. वाड्यातली खोली होती दहा बाय दहाची... आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत गावावरून तिच्याकडं यायचो आणि आठ-आठ दिवस मुक्काम ठोकायचो. आत्या, तिचे यजमान, माझी दोन्ही आत्येभावंडं यांनी कधीही पाहुणे आले म्हणून कुरकुर केल्याचं मला आठवत नाही. उलट त्या वाडासंस्कृतीची मला लहानपणीच (पुण्यात राहत नसूनही) ओळख झाली. त्या छोट्याशा खोलीत आत्याचा संसार आणि तिचा सुगरणीच्या वरताण स्वयंपाक चालायचा. 

आम्ही देशस्थ आणि त्यात गावाकडचे! आमच्याकडं तळणीच्या मोदकांची पद्धत! उकडीचा मोदक हा पदार्थ मी सर्वप्रथम खाल्ला तो या आत्याच्या हातून... तिच्या हातचे उकडीचे मोदक कधीही बिघडले नाहीत. उलट, तिच्यासारखे उत्कृष्ट मोदक मी आजतागायत कुणाचेच खाल्ले नाहीयेत. मी नंतर पुण्यात शिकायला आलो, तरी सणावाराचं माझं गोडधोड खाणं आत्यानं कधी चुकू दिलं नाही. मी जेवायला आपला कायम त्यांच्याकडे! ती गरमागरम उकडीचे मोदक वाढायची, तुपाची धार सोडायची... बाकी काही खाऊ नकोस; फक्त मोदक खा, म्हणायची. मी वेड्यासारखा एखादा मोदक शेवटी खायचो. बाकी भाजी-पोळी खात बसायचो. जेव्हा आपल्याला मिळत असतं, तेव्हा आपल्याला त्याची किंमत नसते, हेच खरं. माझी ही आत्या दहा वर्षांपूर्वी कर्करोगानं गेली. तिला अन्ननलिकेचा कर्करोग झाला होता. तिला शेवटी शेवटी एक घासही खाता यायचा नाही. आयुष्यभर दुसऱ्याला खाऊ घालण्यात आनंद मानणाऱ्या माझ्या या ‘मोठ्या आई’ला शेवटी शेवटी काहीही खाता येत नव्हतं... तिला अन्नच घेता येत नव्हतं... दैवानं केलेला यापेक्षा क्रूर विनोद माझ्या पाहण्यात नाही! 

आजी आणि मोठ्या आत्याच्या तालमीत तयार झालेल्या माझ्या आईच्या हातचा स्वयंपाकही असाच उत्कृष्ट असतो. आईचं माहेर मराठवाड्यातलं. त्यामुळं तिच्या आईच्या हातचे मराठवाडी पदार्थ ती सहज करते. त्यात एसर आमटी किंवा शेंगोळ्यांसारखे पदार्थ तिचे खास फेव्हरिट. आईचा असाच एक पेटंट पदार्थ म्हणजे गव्हाची खीर. आईच्या हातून ज्यांनी ज्यांनी हा पदार्थ खाल्लाय त्यांनी कायमच तिच्याकडं वारंवार त्या खिरीची फर्माईश केलीय. आईचा कधीही न बिघडणारा आणखी एक पदार्थ म्हणजे ओल्या नारळाच्या वड्या. खरं तर आईचा कोकणाशी काहीही संबंध नाही. मात्र, तिच्या सर्व जमणाऱ्या पदार्थांमध्ये नारळाचा समावेश असतो. गव्हाच्या खिरीतही त्या नारळाचं दूध लागतंच. माझ्या लहानपणी आम्ही एकत्र कुटुंबात राहिलो. आजी-आजोबा, माझी धाकटी आत्या (तिचं लग्न होईपर्यंत), माझा काका, नंतर काकू आणि आम्ही एकूण सहा भावंडं... आई प्रत्येकाची आवड-निवड जपत स्वयंपाक करायची. आत्याला लसूण चालायचा नाही. मग तिची भाजी वेगळी... बाकीच्यांची वेगळी. काकाला दही-साखर जेवणात आवडायचं. मग आवर्जून त्याच्यासाठी ती वेगळी दही-साखरेची वाटी काढून ठेवायची... (यावरून एक आठवलं. मला लहानपणी एक विचित्र म्हणावी अशी सवय होती. मला मध्यरात्री जाग यायची व तेव्हा प्यायला मला दूध लागे. आई माझ्या उशाशी दुधाचा कप वर बशी पालथी घालून ठेवायची. मी मध्यरात्री उठून बशीत ते गार दूध ओतून प्यायचो. मला त्यातली साखर ढवळलेली चालायची नाही. मी ती साखर नंतर चमच्याने खायचो.) घरी आलेले पाहुणे सकाळच्या एसटीनं परत जाणार असले, तरी सकाळी सात वाजता त्यांना साग्रसंगीत जेवू घालायचा कार्यक्रम घरी चालायचा. शक्यतो बाहेरचं खाणं टाळण्याकडं कल असायचा. त्यामुळं बाहेर कुठंही जायचं झालं, तरी घरून डबा नेणं ही सर्वमान्य रीत होती. नाही तर दुसऱ्याकडं मेहुण म्हणून, मुंजा म्हणून वा कुमारिका म्हणून जेवायला जाणे हे सर्वांत सोपं होतं!

गावी शाळेत डबा नेण्याची पद्धत नव्हती. सकाळी तीन तास आणि दुपारी तीन तास शाळा भरे. मधला वेळ सरळ घरी यायचं. नंतर माध्यमिक शाळेतसुद्धा घर एवढं जवळ होतं, की दुपारच्या वीस मिनिटांच्या मधल्या सुट्टीत दुपारचा चहा प्यायला घरी यायचो. पुढं नगरमध्ये शाळेत जायला लागल्यावर डबा हा प्रकार आयुष्यात आला. तिथं पोळी, लोणचं आणि एक भाजी हा ठरलेला मेनू असायचा. इतर मित्रांचे डबे उघडले, की मग त्यासोबत त्यांचं सगळं जगणंच नकळत समोर उलगडायचं. काही काही मित्र डबाच आणायचे नाहीत. टाइमपास करत बसायचे. ते डबा का आणत नसतील, हा प्रश्न तेव्हा पडलाच नाही. आता पोटात तुटतं! अर्थात शाळेतल्या वयात असलेला निरागसपणा अंगी होता. तेव्हा कुणीही कुणाच्याही डब्यात हात घालून सहज काहीही खाऊ शकत होता. मीही आपल्या घरी होणाऱ्या भाजीपेक्षा वेगळ्या चवीच्या भाज्या पहिल्यांदा या डब्यांतूनच चाखल्या. तिखटाची ‘गोडी’ लागली ती तिथपासून! एरवी आमच्या घरचं जेवण म्हणजे टिपिकल मध्यमवर्गीय, ब्राह्मणी आणि अळणी! पण आई त्या पदार्थांनाही अशी चव आणते, की विचारू नका. साधी फोडणीची पोळी किंवा फोडणीचा भात असू देत. मला तर वाटतं, महाराष्ट्रातील काही पिढ्याच्या पिढ्या फोडणीची पोळी वा फोडणीचा भात या ब्रेकफास्टवर लहानाच्या मोठ्या झाल्या असतील.

आईच्या हातचं खाणं हा कुठल्याही मुलासाठी 'वीक पॉइंट' असतो आणि त्या भावनेभोवतीच्या सर्व भावनोत्कट बाबी बाजूला ठेवल्या, तरी आमची पिढी घरच्या खाण्याबाबत आजच्या पिढीपेक्षा जास्त समृद्ध होती आणि म्हणूनच जास्त फिट आहे, असं आवर्जून सांगावंसं वाटतं. 

आमच्या लहानपणी गावात बेकरी नव्हतीच. तेव्हा पाव किंवा मैद्याचे अन्य पदार्थ फार उशिरा आयुष्यात आले. अगदी बिस्कीटही खाण्याची फार क्रेझ नव्हती. हे सगळं बालपण संपल्यावर, शहरात गेल्यावर मनसोक्त खायला मिळालं. मात्र, त्यामुळं घरचं सकस अन्न खाऊन लहानपणी जी सुदृढता लाभली ती आजही उपयोगी पडते आहे. आमच्या शेतात पेरूच्या झाडावर बसून, तिथले पेरू तोडून तिथंच खाण्याचं भाग्य मला व माझ्या भावंडांना लाभलं. घरच्या शेतातला गहू, ज्वारी, बाकीचा भाजीपाला खाण्याचं सुख अनुभवता आलं. खूप श्रीमंती होती असं नाही, पण कधी काही कमी पडलं नाही. खाण्या-पिण्यात तर मुळीच नाही. साधं-सुधं, पण सकस व महत्त्वाचं म्हणजे गरमागरम जेवण दोन्ही-तिन्ही वेळांना पोटात जात होतं.

संक्रांतीच्या आधी, ऐन थंडीत धुंधुरमासाचं जेवण हा एक सोहळा असायचा. सकाळी आई लवकर उठून बाजरीची भाकरी, लोणी, वांग्याचं दही कालवलेलं भरीत, तिळाची चटणी असं ताट समोर ठेवी. भावंडांत गप्पागोष्टी करता करता हे जेवण सकाळी कधी संपायचं ते कळायचंही नाही. तीच परिस्थिती भोगीची. ती भोगीची टिपिकल मिक्स भाजी घरात व्हायचीच. आमच्याकडं महालक्ष्म्या यायच्या, तेव्हाही पुरणा-वरणाचा नैवेद्य असायचाच; पण जोडीला  त्या सोळा भाज्या साग्रसंगीत घरी केल्या जायच्या. महालक्ष्मीच्या नैवेद्याचं ताट संपवणं हे एक आव्हान असायचं. घरात अनेकदा मुंजा मुलगा म्हणून मलाच नैवेद्याचं ताट मिळायचं. त्यात काहीही टाकून द्यायचं नाही, अशी अट असायची. पहिल्यांदा कंटाळा यायचा. विशेषत: पंचामृत वगैरे प्रकार भातात कालवून वगैरे शेवटी एकत्र संपवायचे हे मला अजिबात आवडायचं नाही. पण आजूबाजूचे सगळे ज्येष्ठ तसंच जेवतात, हे पाहून मीही तसंच करायला लागलो. त्या अटीमुळं एक मात्र झालं. ताट स्वच्छ करायची सवय लागली. कुठलाही पदार्थ कुरकुर न करता खायची चांगली सवयही लागली. मुळात आई सुगरण असल्यानं ती करत असलेलं काहीही आम्ही मिटक्या मारीत खायचोच आणि आजही खातो. त्यामुळं तिथं अमुक एक आवडत नाही वगैरे प्रश्नच उपस्थित व्हायचा नाही.

माझी आजी मी १८ वर्षांचा असतानाच गेली. म्हणजे तसा तिचा फार सहवास मला लाभला नाही. मात्र, तिनं तिचा सगळा वारसा तिच्या थोरल्या मुलीकडं आणि माझ्या आईकडं सोपवला होता, असं म्हणायला हरकत नाही. या तिन्ही माउल्यांनी माझं केवळ शारीरिक भरणपोषण केलं असं नाही, तर माझ्या संपूर्ण आयुष्याचा निरोगी, सुदृढ पायाही भक्कमपणे रचला. आज मी जो काही आहे, तो त्यांच्या हातचं चवीष्ट अन्न खाऊन आणि पचवून...!

---


(पूर्वप्रसिद्धी : समदा दिवाळी अंक २०२०)

--------

31 Jan 2021

बिंगोस्कोप - भाग १९ ते २१

बिंगोस्कोप

-------------

स्वाती यादवाडकर या मैत्रिणीनं दोन-तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘बिंगोकिड्स’ या लहान मुलांच्या पाक्षिकात मी ‘बिंगोस्कोप’ या सदरात जगभरातील काही उत्तम चित्रपटांची ओळख मुलांना करून दिली. ही रूढार्थाने परीक्षणं नाहीत. साधारण दहा ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी, त्यांना समजेल अशा साध्या-सोप्या भाषेत सिनेमांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. एकूण २१ सिनेमांवर मी या सदरात लिहिलं आहे. हे लिखाण इथं एकत्रित राहील म्हणून तीन-तीन परिचय एकत्र करून एक ब्लॉग अशा रीतीनं प्रसिद्ध करीत आहे. हा सातवा व शेवटचा भाग...

----


१९. हरिश्चंद्राची फॅक्टरी
-----------------------------

हलत्या चित्रांची अद्भुतरम्य सफर...
---------------------------------------

मुलांनो, आपल्या महाराष्ट्रात, या मराठी भूमीत अनेक थोर, कर्तबगार माणसं होऊन गेली. तुम्ही ‘बिंगोस्कोप’ हे सिनेमाचं सदर वाचताय ना, तो सिनेमा भारतात सर्वांत आधी कुणी तयार केला माहिती आहे का? ते एक मराठी गृहस्थ होते आणि त्यांचं नाव होतं दादासाहेब धुंडिराज फाळके. सिनेमाला फाळके ‘हलती चित्रे’ असं म्हणत असत. या ‘हलत्या चित्रांच्या दुनियेचा जादूगार’ असलेल्या फाळकेंच्या जीवनावर ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा सुंदर मराठी चित्रपट २०१० मध्ये आला होता. तुम्ही तो अद्याप पाहिला नसेल, तर नक्की पाहा. भारतात पहिला सिनेमा तयार करणाऱ्या या माणसाची कर्तबगारी तुम्हाला त्यातून समजून येईल. 

परेश मोकाशी या रंगभूमी गाजवून आलेल्या रंगकर्मीनं दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट आहे. दादासाहेब फाळके यांनी तयार केलेल्या पहिल्या मूकपटाचं (तेव्हा चित्रपट ‘बोलत’ नसत; केवळ चित्रे दिसत असत. त्यामुळे त्यांना तेव्हा मूकपट म्हणत असत.) नाव ‘राजा हरिश्चंद्र’ असं होतं. त्यावरून मोकाशींनी आपल्या चित्रपटाचं नाव ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ असं का ठेवलं हे आपल्या लक्षात येईल. सिनेमातही स्वत: दादासाहेब आपल्या या उद्योगाला ‘फॅक्टरी’ असंच संबोधत असत. फाळके हे अतिशय हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होतं. ते जादूचे खेळही करायचे. जगात सर्वप्रथम पॅरिस येथे ल्युमिए बंधूंनी मूकपट सादर केला. त्यानंतर तो वर्षभरातच मुंबईतही दाखविला गेला. त्यानंतर मुंबईत पाश्चात्त्यांनी तयार केलेले मूकपट नेहमी दाखविण्यात येऊ लागले. दादासाहेबांनी असाच एक मूकपट पाहिला व ते भारावून गेले. त्यांना जात्याच नवनव्या गोष्टींचं आकर्षण होतं. त्या आपण शिकून घ्याव्यात असं त्यांना वाटे. त्यांनी तो मूकपट वारंवार पाहिला. अगदी त्यांचे डोळे बिघडून दृष्टी जायची वेळ आली. फाळकेंची पत्नी सरस्वती यांनी दादासाहेबांना कायम साथ दिली. आपल्या पतीमध्ये काही तरी असामान्य करण्याची धमक आहे, हे त्यांनी ओळखलं होतं. दादासाहेबांना दोन मुलगे होते. असं हे सुखी कुटुंब, पण दादासाहेबांच्या चित्रपट तयार करण्याच्या वेडापायी त्या कुटुंबाला आपली सर्व संपत्ती गमावायची वेळ आली. मात्र, दादासाहेब डगमगले नाहीत. ते मुंबईतील काही धनाढ्य व्यापाऱ्यांकडून पैसे घेऊन परदेशात चित्रपटाचं तंत्र शिकण्यासाठी गेले. तिथून परत आल्यावर त्यांनी पहिला मूकपट तयार करायला घेतला. त्याचंच नाव - राजा हरिश्चंद्र. हा सिनेमा तयार करताना त्यांना अतोनात अडचणी आल्या. अखेर हा सिनेमा १९१३ मध्ये तयार झाला आणि भारतातील लोकांनी त्याचं प्रचंड स्वागत केलं. भारतातील ‘चित्रपट युगा’ची ती सुरुवात होती.
हा अतिशय रोमहर्षक, अद्भुत प्रवास परेश मोकाशी  यांनी ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटात अतिशय खेळीमेळीनं मांडला आहे. दादासाहेबांची भूमिका नंदू माधव यांनी केली आहे. दादासाहेबांचं सिनेमाचं वेड, त्यांचा विक्षिप्त स्वभाव, जिद्दी वृत्ती हे सगळं नंदू माधव यांनी फार अप्रतिमपणे सादर केलं आहे. त्यांची या भूमिकेतील निवड एवढी चपखल आहे, की त्यांच्या या भूमिकेवरच सिनेमाचं निम्मं यश निश्चित झालं. विभावरी देशपांडे यांनीही सरस्वतीबाईंची भूमिका छान केली आहे. अथर्व कर्वे आणि मोहित गोखले या दोन बालकलाकारांनीही फाळके यांच्या मुलांची कामं मस्त केली आहेत. इतर सर्व सहकलाकारही उत्तम साथ देतात.
मुळात विसाव्या शतकातील तो सुरुवातीचा काळ, भारतातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील व मुंबईतील तत्कालीन समाजजीवन, तत्कालीन रुढी-परंपरा हे सगळं उभं करणं हे दिग्दर्शकासमोर आव्हान होतं. विशिष्ट काळातील गोष्ट सांगणाऱ्या सिनेमांना ‘पीरियड फिल्म’ म्हणतात. ‘हरिश्चंद्रांची फॅक्टरी’ हा तसाच चित्रपट आहे. त्यामुळं या चित्रपटासाठी कलादिग्दर्शन ही महत्त्वाची गोष्ट ठरते. या चित्रपटात वापरलेले नेपथ्य, सेट्स आणि वेशभूषा आवर्जून पाहा. ही सगळी माणसं १९००-१९१३ या काळात साधारणपणे वावरत आहेत हे गृहीत धरून तसे कपडे वापरावे लागतात. तेव्हाची मुंबई कशी दिसत होती, याचा अभ्यास करून तसे सेट्स तयार करावे लागतात. गिरगावात राहणारी मंडळी ‘तिकडे लांब दादरला कुठं जंगलात राहताय,’ असं बोलत असत, असा उल्लेख चित्रपटात आहे. आज हा उल्लेख ऐकताना आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. तेव्हा महिलांनी चित्रपटात काम करणं समाजमान्य नव्हतं. त्यामुळं फाळकेंना तारामतीच्या भूमिकेसाठी काय काय दिव्य करावं लागलं, हे या सिनेमात पाहायला मिळतं. शेवटी एका पुरुषाला या भूमिकेसाठी फाळके तयार करतात. मात्र, त्याचे वडील जिवंत असल्यानं तो मिशी काढायला तयार होत नाही. तेव्हा वडील जिवंत असताना मिशी काढायची नाही, अशी पद्धत होती. अशा अनेक गमती-जमती यात पाहायला मिळतात.
मुळात  ‘पीरियड फिल्म’ बघताना मनोरंजनासोबत आपल्याला त्या त्या काळाची सफर करता येते. त्यामुळे असे चित्रपट आवर्जून बघावेत. या चित्रपटात परेश मोकाशींनी दादासाहेब फाळक्यांचं चित्रपटाचं वेड हर प्रकारे उतरवलं आहे. त्यामुळंच आपल्याला तो चित्रपट पाहताना फाळक्यांविषयीचं कुतूहल आणखी जागृत होतं. त्या व्यक्तीविषयीची उत्सुकता वाढवतं. कुठलीही चांगली कलाकृती हेच काम करत असते. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’सारखा चित्रपट पाहायचा तो यासाठीच. त्यातही एका मराठी माणसाची ही कर्तबगारी बघताना आपणा मराठी लोकांची कॉलर जरा टाइट होणारच ना!

---

हरिश्चंद्राची फॅक्टरी/भारत/२०१०/मराठी/रंगीत/ ९७ मिनिटे

निर्माते : रॉनी स्क्रूवाला, स्मिती कनोदिया, परेश मोकाशी
कथा व दिग्दर्शक : परेश मोकाशी, संगीत : आनंद मोडक
सिनेमॅटोग्राफी : अमलेंदू चौधरी, संकलन : अमित पवार
प्रमुख भूमिका : नंदू माधव, विभावरी देशपांडे, मोहित गोखले, अथर्व कर्वे, संदीप पाठक

---

२०. बॉर्डर
-----------

सीमेच्या रक्षणास तळहातावर शिर
-----------------------------------------

बालमित्रहो, या महिन्यात आपला ७३ वा स्वातंत्र्यदिन येईल. येत्या १५ ऑगस्टला आपण हा स्वातंत्र्यदिन उत्साहानं साजरा करू. त्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असल्याने आपण तो दिवस कसा सेलिब्रेट करायचा, याचं आधीच नियोजन केलं असेल. आपण कुठे तरी सहलीला जाऊ, मित्रांकडे गप्पा मारायला जाऊ, नाही तर मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहायला जाऊ किंवा मॉलमध्ये खरेदीची मजा करायला जाऊ. आपल्याला हे आनंदाचे, स्वातंत्र्याचे दिवस उपभोगायला मिळत आहेत, याचं कारण पूर्वी कुणी तरी आपल्यासाठी जिवाचा त्याग करून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलंय. आपण १५ ऑगस्टच्या दिवशी मजा जरूर करू; पण ती मजा करताना मनात कुठे तरी या अनाम वीरांविषयी आदराची भावनाही जपू.

या दिवशी सिनेमेच पाहायचे तर आपल्या देशाविषयीचा अभिमान आणखी वृद्धिंगत होईल, असे किती तरी सिनेमे पाहता येतील. आज आपण ‘बॉर्डर’ या चित्रपटाविषयी जाणून घेणार आहोत. आपल्या देशाच्या सीमेचे शत्रूपासून रक्षण करण्यासाठी आपले लष्कर, हवाई दल आणि नौदल किती शौर्याने पराक्रम गाजवते, हे आपल्याला हा चित्रपट पाहून कळते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत तीन मोठी युद्धे झाली, तर लहान-मोठे संघर्ष अनेक झाले. यापैकी १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला. याच युद्धानंतर पूर्व पाकिस्तान हा पाकिस्तानचा भाग मूळ पाकिस्तानपासून फुटून स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली. हे युद्ध सुरुवातीपासून पूर्वेला लढले गेले असले, तरी पश्चिम आघाडीवरही पाकिस्तानने भारताच्या कुरापती काढल्याने त्या भागातही (म्हणजे राजस्थान, पंजाब, काश्मीर) दोन्ही देशांदरम्यान युद्ध भडकले. यापैकी ‘लोंगेवालाची लढाई’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या युद्धातील लढाईवर आधारित हा चित्रपट आहे. प्रामुख्याने युद्धविषयक चित्रपटांचीच निर्मिती करणारे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांनी या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केलं आहे. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात, म्हणजे १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्या वर्षी भारतात बॉक्स ऑफिसवरही सर्वाधिक कमाई केली होती. या चित्रपटात सनी देओल, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, सुदेश बेरी, कुलभूषण खरबंदा, पुनीत इस्सार, राखी, पूजा भट यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाला अनू मलिक यांनी संगीत दिले असून, यातले ‘संदेसे आते है’ हे गाणं अतिशय गाजलं.
‘लोंगेवाला’ हे राजस्थानच्या थर वाळवंटात असलेली भारत व पाकिस्तान यांच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरचे एक प्रमुख ठाणे आहे. चार ते सात डिसेंबर १९७१ च्या दरम्यान इथं दोन्ही देशांदरम्यान मोठी चकमक झडली. युद्धच होतं एक प्रकारे ते! यात भारताच्या बाजूने होते केवळ १२० जवान आणि नंतर त्यांच्या मदतीला आलेली चार ‘हंटर’ लढाऊ विमाने; तर पाकिस्तानकडे होते ४० ते ४५ रणगाडे आणि सुमारे दोन ते तीन हजार सैनिक. तरीही या लढाईत अत्यंत शूर अशा भारतीय जवानांनीच बाजी मारली आणि पाकिस्तानी रणगाडे उद्ध्वस्त करून त्यांच्या सैन्याला पार सीमेपार पिटाळून लावले. येथे प्रमुख होते लष्कराच्या २३ व्या बटालियनचे, पंजाब रेजिमेंटच्या कंपनीचे प्रमुख मेजर कुलदीपसिंग चाँदपुरी. मेजर कुलदीपसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून आपले हे ठाणे कसे वाचविले आणि शत्रूचा पराभव केला याची अत्यंत प्रेरणादायी, रोमांचकारक कथा या चित्रपटातून आपल्यासमोर उलगडते. या चित्रपटात मेजर कुलदीपसिंग यांचे काम सनी देओलनं अत्यंत प्रभावीपणे केलं आहे. सेकंड लेफ्टनंट धरमवीर भान या तरुण अधिकाऱ्याचे काम अक्षय खन्नाने केले आहे. विंग कमांडर आनंद बाजवा यांची भूमिका जॅकी श्रॉफने केलीय. नायब सुभेदार मथुरा दासच्या भूमिकेत सुदेश बेरी आहे, तर सीमा सुरक्षा दलाचे सहायक कमांडंट भैरवसिंग यांचं काम सुनील शेट्टीनं केलंय. याव्यतिरिक्त पुनीत इस्सार, कुलभूषण खरबंदा, राखी या ज्येष्ठ कलाकारांसह तबू, पूजा भट या अभिनेत्रींनीही या चित्रपटातील त्यांच्या भूमिका संस्मरणीय केल्या आहेत.
जवळपास तीन तासांच्या या चित्रपटात केवळ युद्धाची थरारक दृश्ये नाहीत, तर युद्धाला तोंड द्यावं लागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मानसिक स्थितीचाही वेध दिग्दर्शकानं यात घेतला आहे. या अधिकाऱ्यांनाही घर असतं, कुटुंब असतं, त्यांच्यासाठी वाट पाहणारे त्यांचे जीवनसाथी असतात. या सगळ्यांचा विचार बाजूला ठेवून त्यांना फक्त समोर ठाकलेल्या शत्रूला नेस्तनाबूत करण्याचं एकमेव लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवायचं असतं. विपरीत परिस्थिती असली, तरी त्यातून मार्ग काढायचा असतो. कुठल्याही क्षणी प्राणाची आहुती पडण्याची शक्यता असते. हे सगळं डोक्यात ठेवूनही शत्रूवर मात करण्याची लढाई लढायची असते. या सगळ्या नातेसंबंधांचा, मानसिक ताणतणावांचा वेध दिग्दर्शकानं या चित्रपटातून घेतला आहे.
पंधरा ऑगस्टच्या दिवशी ‘बॉर्डर’सारखे चित्रपट जरूर पाहा. दोन गोष्टी साध्य होतील. चित्रपट पाहिल्याने एक प्रकारे मनोरंजनही होईल आणि देशासाठी आपले जवान काय करू शकतात, याचे भारावणारे दर्शनही घडेल. आपल्या हातूनही देशासाठी अशी काही तरी सेवा घडावी, ही भावना यातून तुमच्या मनात प्रबळ झाल्यास हा स्वातंत्र्यदिन सार्थकी लागला, असेच म्हणावे लागेल.

---

बॉर्डर/भारत/१९९७/हिंदी-पंजाबी-उर्दू/रंगीत/१७७ मिनिटे

निर्माते : जे. पी. दत्ता, दिग्दर्शक : जे. पी. दत्ता
संगीत : अनू मलिक, पार्श्वसंगीत : आदेश श्रीवास्तव
सिनेमॅटोग्राफी : ईश्वर बिद्री, निर्मल जानी, संकलन : दीपक वीरकूड
प्रमुख भूमिका : सनी देओल, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना, सुनील शेट्टी, सुदेश बेरी, पुनीत इस्सार, कुलभूषण खरबंदा, राखी, तबू, पूजा भट, श्राबनी मुखर्जी

---

२१. ताऱ्यांचे बेट
-------------------

मोरपीस : मोहवणारे अन् शिकवणारेही!
-----------------------------------------------

बालमित्रहो, दिवाळीच्या सुट्टीची तुमची धमाल सुरू झाली असेल ना! दिवाळी म्हणजे मज्जाच! भरपूर शॉपिंग, ट्रिप,सिनेमे आणि मित्र-मंडळींबरोबर हँगआउट... आहे ना मज्जा? आपण अगदी सहज ही मजा करू शकतो, याचे कारण आपल्या आई-वडिलांकडे पुरेसे पैसे आहेत. त्या दृष्टीने आपण अगदी सुदैवी आहोत. पण अनेक मुलांची ही परिस्थिती नसते. आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टींचा हव्यास धरताना आपल्या घरच्यांची, विशेषत: आपल्या बाबांची आपण अडचण तर करीत नाही आहोत ना, याचा विचार मुलांनी करायला हवा. ‘ताऱ्यांचे बेट’ हा किरण यज्ञोपवित दिग्दर्शित चित्रपट आपल्याला नेमकी हीच शिकवण अगदी साध्या-सोप्या प्रसंगांतून करून देतो. तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल, तर या सुट्टीत आवर्जून पाहा. 

कोकणातील एका गावात राहणाऱ्या निम्नमध्यमवर्गीय मुलाला मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये एक दिवस का होईना, पण राहण्याचे पिसे (वेड) लागते. त्याचं हे म्हटलं तर साधंसं; पण त्याच्या पालकांच्या दृष्टीनं विचार केला तर प्रचंड अवघड असं स्वप्न आणि वास्तवाचा पाठशिवणीचा रंगलेला खेळ म्हणजे हा चित्रपट.
श्रीधर सुर्वे (सचिन खेडेकर) हा कोकणामधल्या एका गावात ग्रामपंचायतीत नोकरी करणारा सरळ माणूस. त्याची दोन मुलं ओंकार (ईशान तांबे) व मीरा (अस्मिता जोगळेकर), बायको इंदिरा (अश्विनी गिरी) आणि मुलांची आजी (शुभांगी जोशी) असं हे कुटुंब मजेत जगत असतं. मुलांना सायकलवरून शाळेत सोडवणं, गावातल्या गणपतीशी रोज सुख-दुःखाच्या गप्पा मित्रत्वाच्या नात्यानं बोलणं आणि रात्री भजनात रंगणं असं त्याचं आयुष्य सुरू आहे. मात्र, त्याच्या या आयुष्यात अचानक मुंबई नावाचं ‘ताऱ्यांचं बेट’ येतं. त्याला कामानिमित्त वारंवार मुंबईला जावं लागतं.
एकदा तो बायको आणि मुलांनाही मुंबई दाखवायला घेऊन जातो. मात्र, जवळ फार पैसे नसल्याने मुलांच्या आवडत्या वस्तूही तो खरेदी करू शकत नाही. त्यातच ओंकारला एक पंचतारांकित हॉटेल दिसतं. या हॉटेलात राहण्याचा हट्ट तो करतो. श्रीधर अर्थातच तो पूर्ण करू शकत नाही. मात्र, गावी परत आल्यावर, शाळेत पहिला नंबर काढलास, तर त्या हॉटेलमध्ये राहायला नेईन, अशी पैज तो मुलाबरोबर लावतो. व्रात्य ओंकार पहिला येऊ शकणार नाही आणि त्याचं हे फाइव्ह-स्टार हॉटेलचं वेड कमी होईल, असा त्याचा अंदाज असतो. मात्र, त्या राजमहालासारख्या हॉटेलात राहायला जायचंच, या वेडानं पछाडलेला ओंकार खूप अभ्यास करतो आणि चक्क पहिला नंबर मिळवतो. आता कसोटी श्रीधरची असते. तो मुंबईला जाऊन त्या हॉटेलची चौकशी करून येतो. एका रात्रीसाठी २२ हजार रुपये मोजावे लागणार असतात. श्रीधरची अर्थातच तेवढी ऐपत नसते. त्यामुळं घरासमोरची होडी विकण्याचा निर्णय तो घेतो. तरीही पैसे कमी पडतात. अखेर सच्छिल श्रीधर त्याच्या स्वभावाला न साजेशा गोष्टीही करू लागतो. शेवटी तो आपल्या मुलाचं स्वप्न साकार करण्यात यशस्वी होतो का? स्वप्नांचा हा प्रवास नेमका कसा पूर्ण होतो? या आणि अशा सर्व प्रश्नांची अपेक्षित उत्तरं देत चित्रपट संपतो.
सौरभ भावे यांच्या मूळ कथेवर किरण, सौरभ आणि शैलेश दुपारे यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. या चित्रपटाची सगळी रचना आणि प्रवास बघितला तर ही एक रूपककथा असल्याचं जाणवतं. मूळ लेखक आणि दिग्दर्शक यांना या प्रवासातून काय सुचवायचं आहे, याचा अत्यंत ठळक आणि नेमका संदेश आपल्यापर्यंत पोचतो. या कथेतला ओंकार म्हणजे सध्याच्या जागतिकीकरणानंतरच्या पिढीचं प्रतीक आहे. ही पिढी त्यांच्या आयुष्यातल्या गोलविषयी अत्यंत स्पष्ट आणि नेमकी भूमिका बाळगून आहे.त्यांच्यात कुठलाही गंड नाही, भय नाही. सत्-असत् किंवा भल्या-बुऱ्याच्या त्यांच्या कल्पना वेगळ्या आहेत. आपल्याला काय मिळवायचं आहे, याचं त्यांचं भान नेमकं आहे. मुंबई किंवा पंचतारांकित हॉटेल म्हणजे या पिढीसमोर असलेल्या मटेरियलिस्टिक, ऐहिक गोष्टींचं प्रतीक म्हणायला हरकत नाही. अर्थात या गोष्टी मिळविण्यासाठी प्रचंड कष्ट करायचीही या पिढीची तयारी आहे.
सचिन खेडेकर आणि अश्विनी गिरी यांनी सहज-सोपा अभिनय करून सुर्वे दांपत्य जिवंत केलंय. ईशान तांबे आणि अस्मिता जोगळेकर या बालकलाकारांनीही खूप छान काम केलंय. विशेषतः ईशानचं खास कौतुक करायला हवं. किशोर कदम, विनय आपटे, जयवंत वाडकर छोट्या भूमिकांतही छाप पाडतात. नंदू घाणेकरांचं संगीतही दाद देण्याजोगं. विशेषतः मुग्धा वैशंपायन हिच्या आवाजातलं ‘पिसे लागले मोरपिसांचे...’ हे रत्नाकर मतकरींचं गीत खासच‌! सुरेश वाडकरांच्या आवाजातला अभंगही जमून आलेला.
थोडक्यात, आपल्या जगण्याचं हे रूपकात्मक प्रतिबिंब जरूर पाहा.  

---

ताऱ्यांचे बेट/भारत/२०११/मराठी/रंगीत/१२१ मिनिटे

निर्माते : शोभा कपूर,एकता कपूर, शीतल भाटिया
दिग्दर्शक : किरण यज्ञोपवित, पटकथा-संवाद : किरणयज्ञोपवित, सौरभ भावे, शैलेश दुपारे
संगीत : नंदू घाणेकर, सिनेमॅटोग्राफी : सुधीर पलसाने
भूमिका : सचिन खेडेकर,अश्विनी गिरी, ईशान तांबे, अस्मिता जोगळेकर, किशोर कदम, विनय आपटे, जयवंत वाडकर

---

(समाप्त)

---

29 Jan 2021

बिंगोस्कोप - भाग १६ ते १८

बिंगोस्कोप

--------------

स्वाती यादवाडकर या मैत्रिणीनं दोन-तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘बिंगोकिड्स’ या लहान मुलांच्या पाक्षिकात मी ‘बिंगोस्कोप’ या सदरात जगभरातील काही उत्तम चित्रपटांची ओळख मुलांना करून दिली. ही रूढार्थाने परीक्षणं नाहीत. साधारण दहा ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी, त्यांना समजेल अशा साध्या-सोप्या भाषेत सिनेमांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. एकूण २१ सिनेमांवर मी या सदरात लिहिलं आहे. हे लिखाण इथं एकत्रित राहील म्हणून तीन-तीन परिचय एकत्र करून एक ब्लॉग अशा रीतीनं प्रसिद्ध करीत आहे. हा सहावा भाग...

----

१६. बालशिवाजी

------------------

राज्यसाधनाची लगबग...

----------------------------

बालमित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचं, मराठी माणसांचं आराध्य दैवत. महाराजांचं जीवन अगदी विलक्षण, अद्‌भुत होतं. अवघ्या ५० वर्षांच्या जीवनात महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, बलाढ्य शत्रूंना तोंड देत स्वराज्य उभारणी करण्याचं अशक्यप्राय कार्य शक्य करून दाखवलं. केवळ महाराष्ट्र किंवा मराठी माणूस नव्हे, तर जगभरातील इतिहासकारांना, अभ्यासकांना, शूरवीरांना महाराजांचं चरित्र नेहमीच भुरळ घालतं. अशा या महापराक्रमी राजाच्या जीवनावर मराठीत अनेक चित्रपट आले. जुन्या जमान्यातील ज्येष्ठ व श्रेष्ठ दिग्दर्शक भालजी पेंढारकर यात आघाडीवर होते. शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग घेऊन हे चित्रपट तयार करण्यात आले. मात्र, शिवबांच्या जडणघडणीचा काळ कुठल्याही चित्रपटात फारसा आला नव्हता. ती उणीव ‘बालशिवाजी’ या चित्रपटाने भरून काढली. विशेष म्हणजे भालजी यांचे चिरंजीव प्रभाकर पेंढारकर यांनीच हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. 

भारतात लहान मुलांसाठी चित्रपट तयार करण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली बाल चित्र समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीतर्फे या चित्रपटाची निर्मिती केली गेली. १९८१ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट अजूनही लहान मुलांसाठीच्या महोत्सवांत आवर्जून दाखवला जातो आणि तो लोकप्रियही आहे. तुम्ही तो बघितला नसेल, तर जरूर पाहा. ‘यू-ट्यूब’वर या चित्रपटाची उत्तम प्रत उपलब्ध आहे. शिवरायांनी अगदी लहान वयातच संघटन, नेतृत्व, शौर्य आणि जिद्द या गुणांच्या जोरावर स्वराज्य स्थापनेचं आव्हान कसं पेललं हे प्रभाकर पेंढारकर यांनी या सिनेमात प्रभावी पद्धतीनं दाखवलं आहे.
मावळातील काही मुले विटी-दांडू खेळत असतात आणि त्यांची विटी खोपडे नावाच्या आदिलशहाच्या सरदाराला लागते, या प्रसंगाने चित्रपटाची सुरुवात होते. या वेळी तिथून जाणारे लहानगे शिवाजीराजे खोपडेंच्या दादागिरीला अटकाव करून, मुलांची विटी त्यांना परत मिळवून देतात. या मुलांमधूनच महाराजांना नंतर स्वराज्याच्या कार्यास वाहून घेणारे, तन-मन-धन अर्पून शिवरायांच्या चरणी निष्ठा वाहून घेणारे अनेक सहकारी मिळाले. ओसाड पडलेल्या पुण्यात शिवराय व जिजामातेने सोन्याच्या नांगराने भूमी नांगरून ही भूमी पुन्हा नांदती केली. तिथून जिजाबाई व दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली बालशिवाजी लहान वयातच पुण्याच्या जहागिरीचा कारभार बघू लागले. गोरगरीब जनतेवर होणारा अन्याय राजे स्वत: निवाडा करून दूर करू लागले. महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या रांझे गावच्या पाटलाला शिवबांनी हात-पाय तोडण्याची कठोर दिली. साध्या-भोळ्या, गरीब शेतकरी कुटुंबांतील मुलांच्या मनगटांत राजांनी देशप्रेमाचा जो अलौकिक जोर भरला, त्याचे प्रभावी चित्रण प्रभाकर पेंढारकरांनी अशा अनेक प्रसंगांतून या चित्रपटात केले आहे. परक्या सत्तेची सेवा करून आपल्याच लोकांना त्रास देणाऱ्या तेव्हाच्या काही अडेलतट्टू सरदारांना शिवबा आपल्या छोट्या सवंगड्यांच्या मदतीने कसा धडा शिकवतात, हेही या चित्रपटात गमतीदार पद्धतीनं दाखवलं आहे.
उत्तरार्धात मग याच मित्रांच्या मदतीनं वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवबा तोरणा किल्ला कसा सर करतात, याची चित्तथरारक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. हा गड सर करण्यासाठी या मुलांसह शिवबांनी केलेल्या हिकमती प्रत्यक्षच पाहायला हव्यात.
हा चित्रपट बघताना आपल्या महाराष्ट्राचा उज्ज्वल इतिहास घडविणारे शिवरायांसारखे व्यक्तिमत्त्व लहानपणापासून कसे घडत गेले, याचे फार सुंदर दर्शन आपल्याला घडते. या दृष्टीने दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर यांनी लिहिलेली या चित्रपटाची पटकथा आणि प्रसंगयोजना पाहण्यासारखी आहे. प्राधान्याने बालप्रेक्षकच डोळ्यांसमोर ठेवून हा चित्रपट निर्मिलेला असल्याने तो मुलांना पाहायला आवडेल, अशीच त्याची एकूण रचना आहे.
या चित्रपटात बालशिवाजीची भूमिका आनंद जोशी या पुण्यातील मुलाने केली आहे. (आता हे डॉ. आनंद जोशी पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर आहेत.) बालशिवाजीचा सगळा रुबाब आनंदनं फार जिवंतपणे साकारला आहे. जिजाबाईंची भूमिका जान्हवी खांडेकर यांनी, तर दादोजींची भूमिका भालचंद्र कुलकर्णी यांनी साकारली आहे. या चित्रपटाला ज्येष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीत दिलं आहे.
मुलांनो, काही चित्रपट फक्त मनोरंजनासाठी पाहायचे नसतात. काही चित्रपटांतून आपल्याला आपला इतिहास समजतो. या भूमीसाठी उत्तुंग कार्य करणारी व्यक्तिमत्त्वे समजतात. त्यांचं कार्य पाहून त्यातून आपल्या आयुष्यात आपणही काही भरीव करू शकतो का, हे पाहायचं असतं. ‘बालशिवाजी’ हा असाच एक प्रेरणादायी चित्रपट आहे. तो बघितला नसेल, तर सुट्टीत आपल्या सर्व मित्रांना घेऊन नक्की पाहा.

---

बालशिवाजी/भारत/१९८१/मराठी/रंगीत/१२० मिनिटे

निर्माते : बाल चित्र समिती, दिग्दर्शक : प्रभाकर पेंढारकर
कथा, पटकथा व संवाद : सुधाकर घोलकर व प्रभाकर पेंढारकर
संगीत : दत्ता डावजेकर, गीते : योगेश, वसंत निनावे
संकलन : मनोहर चौबळ, सिनेमॅटोग्राफी : त्यागराज पेंढारकर
प्रमुख भूमिका : आनंद जोशी, जान्हवी खांडेकर, भालचंद्र कुलकर्णी, बापूसाहेब गावडे, माणिकराज, मधू आपटे

----


१७. तारे जमीं पर...
-----------------------

तो राजहंस एक...
---------------------

मित्रांनो, बारा वर्षांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता आमीर खान यानं निर्मिलेला व दिग्दर्शित केलेला ‘तारे जमीं पर’ हा चित्रपट खूप गाजला. तुम्ही तो पाहिलाय का? पाहिला नसेल तर या सुट्टीत आपल्या मित्रांसोबत नक्की पाहा. आपण वरकरणी इतरांपेक्षा वेगळे दिसत असलो किंवा आपल्यात काही तरी कमी आहे, असं भासत असलं, तरी त्या गोष्टीचा न्यूनगंड बाळगण्याचं कारण नसतं. आपल्याकडं काय चांगलं आहे, त्याचा शोध घ्यावा लागतो आणि जगासमोर तो अभिमानानं मिरवावा लागतो. आपण लहान असताना आपल्याला चांगला, म्हणजे आपल्यातले गुण पारखणारा शिक्षक लाभणं फार महत्त्वाचं असतं. आपल्याला पैलू पाडणारे शिक्षक मिळाले, तर आपलं आयुष्य संपूर्ण बदलून जातं.

आमीर खाननं नेमका हाच विषय घेऊन २००७ मध्ये आणला ‘तारे जमीं पर’ हा चित्रपट. हा चित्रपट तेव्हा प्रचंड गाजला. याचं कारण म्हणजे आपल्याकडच्या शिक्षणपद्धतीमध्ये असलेल्या दोषांवर या चित्रपटानं नेमकं बोट ठेवलं होतं. ईशान अवस्थी हा आठ वर्षांचा मुलगा या चित्रपटाचा नायक आहे. ईशान अभ्यासात कच्चा आहे. मात्र, त्याला चित्रे काढण्याची अत्यंत आवड आहे. त्याचे आई-वडील मात्र त्याचा हा वेगळेपणा ओळखण्यात अयशस्वी ठरतात. मोठ्या भावाप्रमाणे ईशाननेही शाळेत उत्तम गुण मिळविलेच पाहिजेत, असं त्यांना वाटत असतं. मात्र, ईशानमध्ये ‘डिसलेक्सिया’ नावाने ओळखली जाणारी एक शारीरिक स्थिती अस्तित्वात असते. यात त्याला अक्षरांचे क्रम उलटसुलट दिसत असतात. आकड्यांचंही तसंच. त्यामुळं शाळेत सगळे त्याची टर उडवत असतात. एके दिवशी त्याच्या शाळेचा निकाल पाहून त्याचे आई-वडील त्याला पाचगणीला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतात. तिथे ईशानची अवस्था आणखीनच बिकट होते. राजू दामोदरन नावाचा एक अपंग मुलगा त्याचा मित्र होतो. मात्र, ईशान आईच्या आठवणीनं व्याकुळ झालेला असतो. आता ईशानचं काही खरं नाही, असं वाटत असतानाच त्या शाळेत एका आगळ्यावेगळ्या शिक्षकांचं आगमन होतं. राम शंकर निकुंभ असं त्यांचं नाव.
हे सर नेहमीच्या शिक्षकांसारखे नसतातच मुळी. ते वर्गावर येतात तेच विदूषकाची टोपी घालून आणि गाणं म्हणत... एरवी सदैव दुर्मुखलेल्या ईशानची कळी या सरांना पाहून खुलते. निकुंभ सरांना हळूहळू ईशानविषयी समजू लागतं. ईशानचा नक्की प्रॉब्लेम काय आहे आणि त्याच्यासाठी नक्की काय केलं पाहिजे, हे त्यांना नेमकं माहिती असतं. मग निकुंभ सर ईशानमधले गुण कसे ओळखतात, त्याला नैराश्यातून कसे बाहेर काढतात, याची ही कथा आहे.
हा चित्रपट तेव्हा खूप चालला, लोकप्रिय झाला याचं कारण पाहणाऱ्या प्रत्येकाला ईशानमध्ये आपलं बालपण दिसलं. आपल्यापैकी बहुतेक जण सर्वगुणसंपन्न कधीच नसतात. आपल्यात काही ना काही त्रुटी नक्कीच असतात. मात्र, आपल्यावर सर्वोत्कृष्ट होण्याचा, उत्तम गुण मिळविण्याचा, सगळीकडं पहिलंच येण्याचा प्रचंड दबाव असतो. हा दबाव आपण सहन करू शकत नाही. यातल्या ईशानसारखीच आपली अवस्था होते. म्हणून हा चित्रपट पाहताना आपण त्या मुलाशी सहज जोडले जाऊ शकतो.
दर्शिल सफारी या मुलाने यात ईशानचं काम खूप छान केलंय. पुढचे दोन दात सशासारखे पुढं असलेला हा गोड मुलगा ईशानच्या भूमिकेत खूप सहजतेनं वावरलाय. यातलं ‘मैं कभी बतलाता नहीं, पर अंधेरे से डरता हूँ मैं माँ’ हे शंकर महादेवन यांनी गायलेलं अत्यंत अप्रतिम गाणं ऐकून ज्याचे डोळे पाणावत नाहीत, असा माणूस नसेल.
आमीरने यातील निकुंभ सरांची भूमिका फारच समरसून केलीय. आमीरचं स्टारडम त्यानं या चित्रपटापुरतं बाजूला ठेवलं. यात त्याचा प्रवेश मध्यंतराच्या आसपास होतो. मात्र, त्यानं स्वत:वर फोकस न ठेवता तो संपूर्णपणे ईशानच्या भावविश्वावरच ठेवला. त्यामुळंच चित्रपट यशस्वी झाला. ईशानच्या आई-वडिलांच्या भूमिकेत आमीरने तोवर फारसे माहिती नसलेले टिस्का चोप्रा व विपिन शर्मा या दोघांना घेतलं. त्या दोघांचा चेहरा परिचित नसणं त्यांना या भूमिकांसाठी उपयुक्तच ठरलं. दोघांच्याही कामाचं खूप कौतुक झालं.
चित्रपटाची मूळ कथा अमोल गुप्ते यांची होती. आधी या चित्रपटाचे दिग्दर्शनही आधी तेच करणार होते. मात्र, नंतर स्वत: आमीरनेच या चित्रपटाची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली. या चित्रपटातील बरेचसे चित्रिकरण पाचगणी येथील एका शाळेत झालं आहे. असा हा अतिशय सुंदर चित्रपट तुम्ही अद्याप पाहिला नसेल, तर पाहायलाच हवा. नक्की पाहा आणि आम्हालाही कळवा.

---

तारे जमीं पर/भारत/२००७/हिंदी/रंगीत/१६४ मिनिटे

निर्माता : आमीर खान, दिग्दर्शक : आमीर खान
कथा, पटकथा व संवाद : अमोल गुप्ते, संगीत : शंकर-एहसान-लॉय
गीते : प्रसून जोशी, संकलन : दीपा भाटिया
सिनेमॅटोग्राफी : सेतू (सत्यजित पांडे)
प्रमुख भूमिका : दर्शिल सफारी, आमीर खान, टिस्का चोप्रा, विपिन शर्मा

----

१८. द कप
-----------

दुनिया ‘गोल’ है...
---------------------

मुलांनो, आपण एका विशिष्ट प्रदेशात, वातावरणात राहतो. आपल्याभोवती असलेल्या नैसर्गिक गोष्टींचा आपल्यावर परिणाम होत असतो आणि त्याच वेळी आपल्या समाजात असलेल्या रुढी-परंपरा किंवा संस्कारांचाही एक परिणाम आपल्यावर होत असतो. आपण जेव्हा आपल्याकडे तयार झालेले चित्रपट पाहतो, तेव्हा त्यात आपल्याला आपल्या सभोवती असलेलं वातावरण आणि एकूणच सांस्कृतिक पर्यावरण पाहायला मिळतं. मात्र, जेव्हा आपण जगभरात तयार झालेले चित्रपट पाहतो, तेव्हा आपल्याला या वातावरणापेक्षा भिन्न स्थितीत राहत असलेल्या लोकांबद्दल कळतं. त्यांचं जगणं, ते राहतात तो भूभाग, तिथलं पर्यावरण आणि त्यांची सांस्कृतिक जडणघडण आपल्यापेक्षा वेगळी असते. अशा जगभरातील विविध प्रदेशांत राहणाऱ्या लोकांची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. ‘हे विश्वचि माझे घर’ हा भाव आपल्यात निर्माण होण्यास यामुळे मदत होते. जगभरात विविध भाषा बोलल्या जात असल्या, किंवा धार्मिक वा सांस्कृतिक धारणा वेगवेगळ्या असल्या, तरी प्रेम, विश्वास, राग, लोभ, मत्सर अशांसारख्या काही मूलभूत भावना जगभरात एकच आहेत, हे आपल्या लक्षात येतं. एकूणच जग समजावून घेण्यासाठी मदत होते आणि आपला दृष्टिकोन विशाल, उदार होतो. जागतिक सिनेमा पाहायचा तो यासाठीच. 

‘द कप’ हा चित्रपट तुम्ही यासाठी नक्की पाहा. भुतान या भारताच्या शेजारच्या चिमुकल्या देशाचा हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटातील भाषा तिबेटी आहे. बौद्ध धर्माचे मठ असतात व तिथे लहान मुलांना भिख्खू म्हणून शिक्षण घेण्यासाठी ठेवतात. तिबेटमधील अनेक लोक भारतात येऊन राहतात. भारतातील अशाच एका मठात या चित्रपटाची कहाणी घडते. फुटबॉल हा जगभरातील सर्वांत लोकप्रिय खेळ. सन १९९८ मध्ये या फुटबॉलचा वर्ल्ड कप फ्रान्समध्ये भरला होता. या स्पर्धेची पार्श्वभूमी या चित्रपटाला आहे.
मठातलं वातावरण मोठ्या शिस्तीचं असतं. तिथं शिकायला राहणाऱ्या मुलांना बाहेरच्या जगाशी अजिबात संपर्क साधता येत नाही. तिथल्या अत्यंत कडक शिक्षकांच्या पहाऱ्यात त्यांना अभ्यास करावा लागतो. मात्र, कितीही कडेकोट बंदोबस्त असला, तरी बाहेरच्या जगातील झुळुका तिथं येत असतातच. त्यामुळं फुटबॉल वर्ल्ड कपची चर्चा हळूहळू या मठातील मुलांमध्येही सुरू होतेच. त्यातही ऑर्ग्येन आणि लोडो या दोन मुलांचं फुटबॉलप्रेम विशेष असतं. गेको या मठातील प्रमुख पर्यवेक्षकाला ऑर्ग्येन आणि लोडोचं हे बेशिस्त वागणं अजिबात आवडत नसतं. मात्र, तरीही एकदा त्याचा डोळा चुकवून ही दोन मुलं मठाच्या बाहेर पडून, टीव्हीवर चोरून फुटबॉलची मॅच बघून येतात. त्या वर्षी ब्राझील आणि फ्रान्स हे दोन संघ अंतिम फेरीत येतात. ही फायनल मॅच टीव्हीवर लाइव्ह बघण्याची इच्छा या मुलांमध्ये जागृत होते. काहीही करून मठातच टीव्ही आणून हा सामना बघायचाच, असा निश्चय ही मुलं करतात. त्यासाठी ते मठाच्या प्रमुखांनाच साकडं घालतात. आश्चर्य म्हणजे, त्यांची ही मागणी मान्य होते. मात्र, मठात बाहेरून टीव्ही आणायचा कसा आणि थेट प्रक्षेपण पाहायचं कसं, असा प्रश्न या मुलांसमोर असतो. त्यावर ते कशी मात करतात, याची रंजक कहाणी या चित्रपटात आहे.
या कथाभागावरून आपल्या असं लक्षात येईल, की या अशा काही मूलभूत भावना जगभरात सारख्याच असतात. त्यांना कुठल्याही बंधनात अडकवून ठेवता येत नाही. आपल्या मूळ देशापासून दूर, निर्वासितांसारखं जगणं जगत असताना या मठातील सर्व मुलांना तिकडं दूर युरोपात सुरू असलेल्या फुटबॉल स्पर्धेविषयी प्रचंड आकर्षण वाटतं. खेळ माणसांना जोडतो म्हणतात ते असं! एका अर्थानं दुनिया ‘गोल’ है... हे सत्य या सिनेमात सर्व तऱ्हेनं सिद्ध होतं. या चित्रपटाचा दिग्दर्शक ख्येन्त्से नोर्बू हा स्वत: एका तिबेटी मठात ‘लामा’ (धर्मगुरू) म्हणून काम करीत होता. त्याला सिनेमाचं वेड होतं. त्यानं नंतर न्यूयॉर्कमधील चित्रपट विद्यालयात जाऊन सिनेमाविषयक शिक्षण घेतलं. सिनेमाविषयीच्या या आत्यंतिक वेडातूनच त्यानं भुतानचा पहिलावहिला चित्रपट तयार केला. एका अर्थानं हा ‘द कप’ चित्रपट म्हणजे या दिग्दर्शकालाही मिळालेला ‘कप’च आहे. या चित्रपटाचं जगभरातून स्वागत झालं. अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांतून तो दाखविला गेला. तुम्हीही नक्की पाहा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा... 

---

द कप/भुतान/१९९९/तिबेटी/रंगीत/९३ मिनिटे

निर्माते : जेरेमी थॉमस, रेमंड स्टेइनर, माल्कम वॉटसन
कथा व दिग्दर्शक : ख्येन्त्से नोर्बू
प्रमुख भूमिका : ऑर्ग्येन टोबग्याल, नेतेन चोकलिंग, जामयांग लोड्रो

----

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----

19 Dec 2020

बिंगोस्कोप - भाग १३ ते १५

बिंगोस्कोप
---------------

स्वाती यादवाडकर या मैत्रिणीनं दोन-तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘बिंगोकिड्स’ या लहान मुलांच्या पाक्षिकात मी ‘बिंगोस्कोप’ या सदरात जगभरातील काही उत्तम चित्रपटांची ओळख मुलांना करून दिली. ही रूढार्थाने परीक्षणं नाहीत. साधारण दहा ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी, त्यांना समजेल अशा साध्या-सोप्या भाषेत सिनेमांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. एकूण २१ सिनेमांवर मी या सदरात लिहिलं आहे. हे लिखाण इथं एकत्रित राहील म्हणून तीन-तीन परिचय एकत्र करून एक ब्लॉग अशा रीतीनं प्रसिद्ध करीत आहे. हा पाचवा भाग...

----

१३. साउंड ऑफ म्युझिक
-----------------------------

जगण्याचं सुरेल गाणं
-------------------------

मित्रांनो, आपल्याला गाणी ऐकायला, म्हणायला, गुणगुणायला आवडतात ना? संगीत आवडत नाही, सूर आवडत नाहीत अशी माणसं फारशी नसतात. आपल्याला सगळ्यांनाच संगीत आवडतं. गाणी आवडतात. पण कल्पना करा, हे संगीत, हे सूर, ही गाणी आपल्या आयुष्यात नसती तर? आयुष्य किती नीरस झालं असतं, ना! अगदी गद्य, रुक्ष अशा त्या ‘बोअर’ जगण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. मात्र, अशा काही नीरस लोकांच्या जगण्यात संगीताचे सूर भरण्याची एक कथा म्हणजेच ‘साउंड ऑफ म्युझिक’ हा अत्यंत गाजलेला इंग्लिश चित्रपट. सुमारे ५३ वर्षांपूर्वी आलेला हा चित्रपट जगभरात अतिशय नावाजला गेला. त्यातल्या संगीताचं, गाण्याचं, ज्यूली अँड्र्यूज या प्रमुख अभिनेत्रीचं सगळीकडं खूप कौतुक झालं. यातली ‘डो रे मी’, ‘साउंड ऑफ म्युझिक’, ‘आय ॲम सिक्स्टीन, गोइंग ऑन सेव्हन्टीन’ आदी गाणी प्रचंड गाजली. अजूनही ती ऐकली जातात.

मारिया (ज्यूली) आणि निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन जॉर्ज व्हॉन ट्रॅप (ख्रिस्तोफर प्लमर) यांची ही कथा आहे. ही कथा साल्सबर्ग (ऑस्ट्रिया) येथे सन १९३८ मध्ये घडते. मारिया नन म्हणून काम करण्यासाठी जाते. मात्र, तिची संगीताची आवड, पर्वतांविषयीचं प्रेम, एकूणच खळाळत्या उत्साहानं जगणं आणि काहीशी बेशिस्त, स्वैर जीवनशैली यामुळं ती हे शिक्षण पूर्ण करू शकणार नाही, असं तिच्या शिक्षिकेला वाटतं. ती तिला कॅप्टन ट्रॅप यांच्याकडं पाठवते. त्यांच्या सात मुलांची आया म्हणून तिला काम करायचं असतं. या मुलांना आई नसते. कॅप्टनसाहेबांच्या कडक शिस्तीखाली ही सगळी मुलं अतिशय दबलेली असतात. कॅप्टनसाहेब व्हिएन्नाला जातात, तेव्हा मारिया या मुलांना गायला, मोकळेपणाने जगायला शिकवते. ते परत येतात, तेव्हा त्यांना मुलांचं हे वागणं बिलकुल रुचत नाही. मात्र, हळूहळू त्यांच्यात बदल होत जातो. तेही अनेक वर्षांनी गायला लागतात. नंतर या मुलांना प्रसिद्ध अशा साल्सबर्ग फेस्टिव्हलमध्ये गाण्याच्या स्पर्धेत पाठवावं, अशी टूम निघते. मात्र, कॅप्टनसाहेब त्यास नकार देतात. पुढे अशा काही गोष्टी घडत जातात, की संगीतच या कुटुंबाला एकत्र आणते. त्या गोष्टींचा आनंद प्रत्यक्ष सिनेमा पाहताना लुटणेच योग्य.
रॉबर्ट वाइज या दिग्दर्शकानं काही सत्य घटनांवरून हा सिनेमा तयार केला आहे. मारिया व्हॉन ट्रॅप यांच्या ‘द स्टोरी ऑफ द ट्रॅप फॅमिली सिंगर्स’ या नावाच्या पुस्तकावरून ‘साउंड ऑफ म्युझिक’ नावाची संगीतिका १९५९ मध्ये रंगमंचावर आली होती. ऑस्कर हॅमरस्टाइन II यांनी यातली गीते लिहिली होती, तर रिचर्ड रॉजर्स यांनी त्या संगीतिकेचं संगीत दिग्दर्शन केलं होतं. नंतर रॉबर्ट वाइज यांनी हा चित्रपट तयार केला, तेव्हा त्या चित्रपटाचं संगीतही रॉजर्स यांनीच दिलं. हा चित्रपट अमेरिकेत २ मार्च १९६५ रोजी फारसा गाजावाजा न होता, मर्यादित स्वरूपात प्रदर्शित झाला होता. मात्र, लवकरच या चित्रपटानं तुफान लोकप्रियता मिळविली आणि अवघ्या चार आठवड्यांत तो त्या वर्षातला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. पुढील वर्षभरातच या चित्रपटाने उत्पन्नाचे आणखी विक्रम मोडले आणि (‘गॉन विथ द विंड’ला मागे टाकून) तो सार्वकालिक सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. हा विक्रम या चित्रपटाच्या नावावर पुढील पाच वर्षे राहिला. या चित्रपटातील मारियाच्या भूमिकेमुळं ज्यूली अँड्रयूज ही अभिनेत्री अजरामर झाली. या चित्रपटामुळे आपल्या चित्रकर्मींनाही प्रेरणा मिळाली. प्रख्यात गीतकार-दिग्दर्शक गुलजार यांनी या चित्रपटावरून काहीसा बेतलेला ‘परिचय’ हा चित्रपट १९७२ मध्ये तयार केला होता.
पुढे तर ‘साउंड ऑफ म्युझिक’ हा चित्रपट म्हणजे एक दंतकथा ठरला. या चित्रपटाने त्या वर्षी पाच ऑस्कर पुरस्कार पटकावले. त्यात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट चित्रपट या पुरस्कारांचा समावेश होता. जगभरातील लोकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला. याचं कारण म्हणजे हा चित्रपट सांगत असलेली संगीताची भाषा सर्वांना समजणारी होती. सूरांनी साधल्या जाणाऱ्या संवादाला भाषेचं बंधन नसतंच. शिवाय या चित्रपटातून केवळ संगीताची महती सांगितली आहे असं नाही. किंबहुना कुठलंही आनंददायी जगणं सुरेलच असतं, असा मंत्र हा सिनेमा आपल्याला देतो. या सिनेमात दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीचा काळ आहे. या महायुद्धामुळे युरोपातील अनेक देशांची मोठी होरपळ झाली. माणसामाणसांत द्वेष असू नये, प्रेमानं-एकोप्यानं सर्वांनी गाणं गात, गुणगुणत, हसत जगावं, असा साधासोपा संदेश देणारा हा सिनेमा युद्धाच्या क्रौर्याच्या पार्श्वभूमीवर त्या काळी सर्वांना अत्यंत आवडावा, यात आश्चर्य नव्हतं. या सिनेमाने सांगितलेली मानवी मूल्यं चिरंतन आहेत. त्यामुळंच आजही हा सिनेमा पाहताना कंटाळा येत नाही. तुम्ही तो अजून पाहिला नसेल, तर नक्की पाहा. तब्बल तीन तास सूरांच्या सहवासात हरवून जा...

----

साउंड ऑफ म्युझिक (अमेरिका/इंग्लिश/१९६५/रंगीत/१७४ मिनिटे)

निर्माते : रॉबर्ट वाइज, दिग्दर्शक : रॉबर्ट वाइज, कथा : मारिया व्हॉन ट्रॅप, पटकथा : अर्नेस्ट लेहमन
प्रमुख भूमिका : ज्यूली अँड्र्यूज, ख्रिस्तोफर प्लमर, एलिनॉर पार्कर, पेगी वूड
संगीत : रिचर्ड रॉजर्स, ऑस्कर हॅमरस्टाइन II
सिनेमॅटोग्राफी : टेड डी मॅक्कॉर्ड
संकलन : विल्यम रेनॉल्ड्स

---

१४. एलिझाबेथ एकादशी
-----------------------------

गजर मूल्यांचा...
------------------

मुलांनो, २०१४ मध्ये बालदिनाच्या म्हणजेच १४ नोव्हेंबरच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘एलिझाबेथ एकादशी’ या गमतीशीर नावाचा मराठी सिनेमा तुम्ही पाहिला आहे का? नसेल, तर नक्की पाहा. लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून, त्यांच्या भावविश्वाची सुंदर गुंफण असलेले फार मोजके सिनेमे मराठीत तयार झाले आहेत. त्यापैकी हा एक महत्त्वाचा चित्रपट आहे. या सिनेमाच्या गमतीशीर नावाचा उलगडा पटकन होत नाही. सिनेमाचं पोस्टर पाहिल्यावर लक्षात येतं, की त्यात एक मस्त, वेगळ्या डिझाइनची सायकल दिसते आहे. या सायकलचंच नाव ‘एलिझाबेथ’ असतं. आता सायकलला असं वेगळंच नाव का असतं, ते सिनेमा पाहिल्यावरच कळेल. शिवाय ‘एकादशी’ का म्हटलंय, तर ही कथा पंढरपूरमध्ये घडते आणि तिथं आषाढी एकादशीच्या दिवशी जी मोठी यात्रा भरते, तिला या कथेत महत्त्व आहे. 

दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी ही अत्यंत साधी, सरळ, हृदयस्पर्शी गोष्ट अत्यंत सुंदररीत्या सांगितली आहे. ज्ञानेश व मुक्ता ही दोन मुलं आपल्या आई व आजीसोबत पंढरपूरमध्ये राहत असतात. (या मुलांची नावं संत ज्ञानेश्वर व मुक्ताबाई यांच्यावरून प्रेरित आहेत, हे आपल्या लक्षात आलंच असेल.) या मुलांच्या वडिलांचं निधन झालेलं असतं आणि आई मशिनवर स्वेटर तयार करून संसार चालवत असते. ज्ञानेश शाळेत अतिशय हुशार असतो, पण त्याच्याकडे फीसाठीही पैसे नसतात. त्याचे शिक्षकच त्याच्या फीचे पैसे भरत असतात. कर्ज फेडता न आल्याने त्याच्या आईचे मशिनही बँकेचे लोक घेऊन जातात. आता ते सोडवून आणण्यासाठी आईकडं एकच उपाय असतो. तो म्हणजे ज्ञानेशची सायकल - ‘एलिझाबेथ’ विकणे. ही सायकल ज्ञानेशच्या विज्ञाननिष्ठ वडिलांनी त्याला खास तयार करून दिलेली असते. त्यामुळे त्याला ती मुळीच विकण्याची इच्छा नसते. मग ही सायकल वाचवण्यासाठी ही भावंडं आणि त्यांचे मित्र काय युक्ती करतात, याची ही कथा आहे.
परेशची पत्नी व मूळची पंढरपूर निवासी असलेल्या मधुगंधा कुलकर्णी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. त्यांच्या अस्सल अनुभवांची जोड असल्यानं हा चित्रपट अगदी वास्तववादी झाला आहे. पंढरपूरमधील जुने वाडे, गल्ल्या, यात्रेच्या आधी त्या गावात सुरू होणारी लगबग, वारकऱ्यांचे आगमन, तीर्थक्षेत्र असलेल्या गावाची अर्थव्यवस्था अशा अनेक गोष्टी कळत-नकळत सिनेमात दिसत राहतात. अत्यंत साध्या-साध्या, पण हृदयाला भिडणाऱ्या प्रसंगांतून चित्रपट पुढं सरकत राहतो. परेशच्या या सिनेमावर इराणी सिनेमाचा प्रभाव अगदी स्पष्ट दिसतो. साध्या माणसांचं साधंच जगणं त्यातल्या हळव्या-नाजूक क्षणांसह टिपणं ही इराणी दिग्दर्शकांची खासियत! परेशही या सिनेमात हे साधतो. शिवाय कथानकाला इथल्या अस्सल मातीची जोड असल्यानं हा सिनेमा वेगळीच उंची गाठतो. 
या चित्रपटात ज्ञानेशच्या कुटुंबाच्या माध्यमातून दिग्दर्शक या मातीत रुजलेल्या संस्कारांची, नीतिमूल्यांची शिकवण देतो. तीही कुठलाही आविर्भाव न आणता! त्यामुळंच हा चित्रपट मनाला भिडतो. या चित्रपटात श्रीरंग महाजन या मुलानं ज्ञानेशची, तर सायली भंडारकवठेकर या मुलीनं मुक्ताची भूमिका केली आहे. या दोन मुलांनी फारच सुंदर काम केलं आहे. मुलांच्या आईच्या भूमिकेत नंदिता धुरी, तर आजीच्या भूमिकेत वनमाला किणीकर यांनीही फार समजून-उमजून काम केलंय. मुळात हे सगळे अभिनय करताहेत, असं कुठंच वाटत नाही. आपण पंढरपुरातील एखाद्या घरातील प्रसंग पाहतो आहोत, असंच वाटतं. या चित्रपटातून पंढरपूरचं सामाजिक दर्शन तर घडतंच, पण त्यानिमित्तानं महाराष्ट्राचं, इथल्या मराठी समाजाचं एक हृद्य चित्रण पाहायला मिळतं. या कारणासाठी हा सिनेमा नक्की बघा.
यात ‘दगड दगड’ असं एक गाणं स्वत: दिग्दर्शकानंच लिहिलं आहे. त्याला दिवंगत संगीतकार आनंद मोडक यांनी संगीत दिलंय. शरयू दातेनं गायलेलं हे गाणंही मस्त जमलं आहे. याशिवाय ज्ञानेश घरी पाहुणे म्हणून आलेल्या वारकऱ्यांसमोर कीर्तन करतो, तो प्रसंगही खूप रंगला आहे. या चित्रपटात पुष्कर लोणारकर या मुलानं ज्ञानेशच्या मित्राच्या, म्हणजे गण्याच्या भूमिकेत धमाल केली आहे. यातले मुलांचे सगळेच प्रसंग खूप गमतीदार, हसवणारे, तर प्रसंगी डोळ्यांत पाणी आणणारे झाले आहेत.
या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा ‘संत तुकाराम’ पुरस्कारही मिळाला. या चित्रपटाला मोठी लोकप्रियताही लाभली. असा हा चित्रपट तुम्ही अद्याप पाहिला नसल्यास मित्र-मैत्रिणींसह जरूर पाहा.

----

एलिझाबेथ एकादशी (भारत/मराठी/२०१४/रंगीत/९० मिनिटे)

निर्माते : निखिल साने, नितीन केणी, मधुगंधा कुलकर्णी
दिग्दर्शक : परेश मोकाशी, कथा : मधुगंधा कुलकर्णी, पटकथा : परेश मोकाशी
संगीत : आनंद मोडक, सिनेमॅटोग्राफर : अमोल गोळे, संकलन : अभिजित देशपांडे
प्रमुख भूमिका : नंदिता धुरी, श्रीरंग महाजन, सायली भंडारकवठेकर, वनमाला किणीकर, पुष्कर लोणारकर

---

१५. मकडी

--------------

भयाचं गमतीदार जाळं!
---------------------------

मुलांनो, तुम्ही कोळ्याचं जाळं कधी पाहिलं आहे का? एखाद्या कसबी कारागिरासारखं विणलेलं हे भक्कम जाळं म्हणजे कोळ्याच्या भक्ष्याचं साक्षात मरणच! कुणी त्या जाळ्यात अडकला, तर त्याची सुटका नाहीच. कधी संधी मिळाली तर त्या छोट्याशा कीटकानं बारकाईनं विणलेलं हे जाळं जरूर पाहा. याशिवाय ‘स्पायडरमॅन’ तर तुम्हाला माहिती आहेच. स्पायडर म्हणजे कोळीच! हिंदीत या कोळ्याला ‘मकडी’ असं म्हणतात. विशाल भारद्वाज या प्रतिभावंत दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेला याच नावाचा हिंदी सिनेमा तुम्ही पाहिला आहे का? नसेल तर नक्की पाहा. लहान मुलांना आवडणाऱ्या सर्व गोष्टी यात आहेत. परीची, राक्षसाची, भुताची किंवा पडक्या वाड्यातील रहस्याची गोष्ट आपल्याला वाचायला आवडते. हा चित्रपटही अशाच अद्‘भुत’रम्य दुनियेची सैर घडवितो.

उत्तर भारतातल्या एका छोट्या गावात ही गोष्ट घडते. यात चुन्नी आणि मुन्नी नावाच्या दोन जुळ्या बहिणी आहेत. चुन्नी ही अत्यंत खोडकर, तर मुन्नी ही तिची बहीण गरीब. चुन्नी जुळेपणाचा फायदा घेऊन गावकऱ्यांची नेहमी गंमत करीत असते. ‘मुघले आझम’ या गमतीशीर नावाचा त्यांचा एक छोटा मित्रही असतो. याच गावात एक जुना ओसाड महालवजा वाडा असतो. या वाड्यात ‘मकडी’ नावाची गूढ स्त्री राहत असते. ही ‘मकडी’ जादूगार असून, तिच्या तावडीत कुणी सापडलं, तर ती त्या व्यक्तीचं रूपांतर कुठल्याही प्राण्यात किंवा पक्ष्यात करते, असा समज गावकऱ्यांमध्ये असतो. त्यामुळं त्या वाड्याकडं लहान मुलंच काय, मोठ्यांनाही फिरकायला खूप भीती वाटत असते. या गावात राहणाऱ्या कल्लू नावाच्या खाटकाशी चुन्नी-मुन्नी व मुघले आझम या तिघांचंही मुळीच पटत नसतं. एकदा चुन्नी नेहमीप्रमाणे कल्लूची काही तरी खोडी काढते. कल्लू तिच्या मागे धावतो. मात्र, तो गडबडीत चुकून मुन्नीलाच चुन्नी समजतो आणि तिचा पाठलाग करायला लागतो. घाबरलेली मुन्नी चुकून त्या ‘मकडी’च्या वाड्यात शिरते. चुन्नीला जेव्हा हे कळतं, तेव्हा ती तिला शोधायला त्या वाड्याकडे धावते. मुन्नीला आपण कोंबडी केलं, असं ‘मकडी’ तिला सांगते. चुन्नीला जेव्हा त्या लाल कापडाखाली खरोखर एक कोंबडी दिसते, तेव्हा तिला जबरदस्त धक्का बसतो. ती ‘मकडी’च्या पाया पडून, रडून तिला आपल्या गरीब बहिणीला परत माणूस करण्याची विनंती करते. मात्र, ‘मकडी’ त्याला नकार देते. अखेर ती चुन्नीपुढं एक अट ठेवते. चुन्नीनं तिला शंभर कोंबड्या आणून दिल्या, तरच ती मुन्नीला परत माणूस करणार असते. आता चुन्नीपुढं ‘मकडी’साठी शंभर कोंबड्या गोळा करायचं आव्हान उभं राहतं... पुढं चुन्नी काय करते, मुन्नी खरंच कोंबडी झालेली असते का, ‘मकडी’ नक्की कोण असते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायला ‘मकडी’ चित्रपट पाहायलाच हवा.

विशाल भारद्वाज या संगीतकार-दिग्दर्शकानं या चित्रपटाद्वारे आपण उत्कृष्ट बालचित्रपट देऊ शकतो, हे सिद्ध केलं. या चित्रपटाचं आकर्षण होतं ते ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी यात साकारलेली ‘मकडी’ची प्रमुख भूमिका. आझमी यांच्या कारकिर्दीतील उत्कृष्ट भूमिकांपैकी ही एक भूमिका म्हणता येईल. त्यांना या भूमिकेसाठी चेटकिणीची जी वेषभूषा केली आहे, तीही बारकाईने पाहा. श्वेता बसू प्रसाद या चुणचुणीत मुलीनं यातल्या चुन्नी व मुन्नीची भूमिका अगदी झकास रंगविली आहे. तिला या भूमिकेसाठी २००३ चा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मकरंद देशपांडे या रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंतानं यातील कल्लू खाटकाची भूमिका केली आहे. या चित्रपटातील ‘मकडी’चा जुनाट भयावह वाडा आणि तिची एंट्री पाहताना लहान मुलं हमखास दचकतात. उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि पार्श्वसंगीत हेही या चित्रपटाचं वैशिष्ट्य होय.
‘मकडी’ चित्रपट २२ नोव्हेंबर २००२ रोजी भारतात सर्वत्र प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शिकागो आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे दुसरे पारितोषिक मिळाले. याशिवाय प्रतिष्ठेच्या कान्स चित्रपट महोत्सवातही हा चित्रपट दाखविला गेला. या संपूर्ण चित्रपटाचं चित्रिकरण अलिबागजवळ वाघोली नावाच्या गावात व गोव्यात करण्यात आलं आहे. सिनेमा संपल्यावर येणारं ‘छुट्टी है छुट्टी’ हे गाणं खूप लोकप्रिय आहे. अनेक स्नेहसंमेलनांमध्ये तुम्ही ते ऐकलंही असेल.
विशाल भारद्वाज या दिग्दर्शकाचा हा उत्कृष्ट बालचित्रपट तुम्ही नक्की पाहा आणि मोठे झाल्यावर या दिग्दर्शकाच्या अन्य महत्त्वाच्या कलाकृतीही आवर्जून पाहा. 

---

मकडी (भारत/हिंदी/२००२/रंगीत/९० मिनिटे)

निर्माता : विशाल भारद्वाज, दिग्दर्शक : विशाल भारद्वाज
कथा : अब्बास टायरवाला, विशाल भारद्वाज, पटकथा : विशाल भारद्वाज, संगीत : विशाल भारद्वाज
गीते : गुलजार, सिनेमॅटोग्राफर : हेमंत चतुर्वेदी, संकलन : आरिफ शेख
प्रमुख भूमिका : शबाना आझमी, श्वेता बसू प्रसाद, मकरंद देशपांडे, आलाप माजगावकर, दयाशंकर पांडे

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----