29 Jan 2021

बिंगोस्कोप - भाग १६ ते १८

बिंगोस्कोप

--------------

स्वाती यादवाडकर या मैत्रिणीनं दोन-तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘बिंगोकिड्स’ या लहान मुलांच्या पाक्षिकात मी ‘बिंगोस्कोप’ या सदरात जगभरातील काही उत्तम चित्रपटांची ओळख मुलांना करून दिली. ही रूढार्थाने परीक्षणं नाहीत. साधारण दहा ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी, त्यांना समजेल अशा साध्या-सोप्या भाषेत सिनेमांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. एकूण २१ सिनेमांवर मी या सदरात लिहिलं आहे. हे लिखाण इथं एकत्रित राहील म्हणून तीन-तीन परिचय एकत्र करून एक ब्लॉग अशा रीतीनं प्रसिद्ध करीत आहे. हा सहावा भाग...

----

१६. बालशिवाजी

------------------

राज्यसाधनाची लगबग...

----------------------------

बालमित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचं, मराठी माणसांचं आराध्य दैवत. महाराजांचं जीवन अगदी विलक्षण, अद्‌भुत होतं. अवघ्या ५० वर्षांच्या जीवनात महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, बलाढ्य शत्रूंना तोंड देत स्वराज्य उभारणी करण्याचं अशक्यप्राय कार्य शक्य करून दाखवलं. केवळ महाराष्ट्र किंवा मराठी माणूस नव्हे, तर जगभरातील इतिहासकारांना, अभ्यासकांना, शूरवीरांना महाराजांचं चरित्र नेहमीच भुरळ घालतं. अशा या महापराक्रमी राजाच्या जीवनावर मराठीत अनेक चित्रपट आले. जुन्या जमान्यातील ज्येष्ठ व श्रेष्ठ दिग्दर्शक भालजी पेंढारकर यात आघाडीवर होते. शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग घेऊन हे चित्रपट तयार करण्यात आले. मात्र, शिवबांच्या जडणघडणीचा काळ कुठल्याही चित्रपटात फारसा आला नव्हता. ती उणीव ‘बालशिवाजी’ या चित्रपटाने भरून काढली. विशेष म्हणजे भालजी यांचे चिरंजीव प्रभाकर पेंढारकर यांनीच हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. 

भारतात लहान मुलांसाठी चित्रपट तयार करण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली बाल चित्र समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीतर्फे या चित्रपटाची निर्मिती केली गेली. १९८१ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट अजूनही लहान मुलांसाठीच्या महोत्सवांत आवर्जून दाखवला जातो आणि तो लोकप्रियही आहे. तुम्ही तो बघितला नसेल, तर जरूर पाहा. ‘यू-ट्यूब’वर या चित्रपटाची उत्तम प्रत उपलब्ध आहे. शिवरायांनी अगदी लहान वयातच संघटन, नेतृत्व, शौर्य आणि जिद्द या गुणांच्या जोरावर स्वराज्य स्थापनेचं आव्हान कसं पेललं हे प्रभाकर पेंढारकर यांनी या सिनेमात प्रभावी पद्धतीनं दाखवलं आहे.
मावळातील काही मुले विटी-दांडू खेळत असतात आणि त्यांची विटी खोपडे नावाच्या आदिलशहाच्या सरदाराला लागते, या प्रसंगाने चित्रपटाची सुरुवात होते. या वेळी तिथून जाणारे लहानगे शिवाजीराजे खोपडेंच्या दादागिरीला अटकाव करून, मुलांची विटी त्यांना परत मिळवून देतात. या मुलांमधूनच महाराजांना नंतर स्वराज्याच्या कार्यास वाहून घेणारे, तन-मन-धन अर्पून शिवरायांच्या चरणी निष्ठा वाहून घेणारे अनेक सहकारी मिळाले. ओसाड पडलेल्या पुण्यात शिवराय व जिजामातेने सोन्याच्या नांगराने भूमी नांगरून ही भूमी पुन्हा नांदती केली. तिथून जिजाबाई व दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली बालशिवाजी लहान वयातच पुण्याच्या जहागिरीचा कारभार बघू लागले. गोरगरीब जनतेवर होणारा अन्याय राजे स्वत: निवाडा करून दूर करू लागले. महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या रांझे गावच्या पाटलाला शिवबांनी हात-पाय तोडण्याची कठोर दिली. साध्या-भोळ्या, गरीब शेतकरी कुटुंबांतील मुलांच्या मनगटांत राजांनी देशप्रेमाचा जो अलौकिक जोर भरला, त्याचे प्रभावी चित्रण प्रभाकर पेंढारकरांनी अशा अनेक प्रसंगांतून या चित्रपटात केले आहे. परक्या सत्तेची सेवा करून आपल्याच लोकांना त्रास देणाऱ्या तेव्हाच्या काही अडेलतट्टू सरदारांना शिवबा आपल्या छोट्या सवंगड्यांच्या मदतीने कसा धडा शिकवतात, हेही या चित्रपटात गमतीदार पद्धतीनं दाखवलं आहे.
उत्तरार्धात मग याच मित्रांच्या मदतीनं वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवबा तोरणा किल्ला कसा सर करतात, याची चित्तथरारक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. हा गड सर करण्यासाठी या मुलांसह शिवबांनी केलेल्या हिकमती प्रत्यक्षच पाहायला हव्यात.
हा चित्रपट बघताना आपल्या महाराष्ट्राचा उज्ज्वल इतिहास घडविणारे शिवरायांसारखे व्यक्तिमत्त्व लहानपणापासून कसे घडत गेले, याचे फार सुंदर दर्शन आपल्याला घडते. या दृष्टीने दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर यांनी लिहिलेली या चित्रपटाची पटकथा आणि प्रसंगयोजना पाहण्यासारखी आहे. प्राधान्याने बालप्रेक्षकच डोळ्यांसमोर ठेवून हा चित्रपट निर्मिलेला असल्याने तो मुलांना पाहायला आवडेल, अशीच त्याची एकूण रचना आहे.
या चित्रपटात बालशिवाजीची भूमिका आनंद जोशी या पुण्यातील मुलाने केली आहे. (आता हे डॉ. आनंद जोशी पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर आहेत.) बालशिवाजीचा सगळा रुबाब आनंदनं फार जिवंतपणे साकारला आहे. जिजाबाईंची भूमिका जान्हवी खांडेकर यांनी, तर दादोजींची भूमिका भालचंद्र कुलकर्णी यांनी साकारली आहे. या चित्रपटाला ज्येष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीत दिलं आहे.
मुलांनो, काही चित्रपट फक्त मनोरंजनासाठी पाहायचे नसतात. काही चित्रपटांतून आपल्याला आपला इतिहास समजतो. या भूमीसाठी उत्तुंग कार्य करणारी व्यक्तिमत्त्वे समजतात. त्यांचं कार्य पाहून त्यातून आपल्या आयुष्यात आपणही काही भरीव करू शकतो का, हे पाहायचं असतं. ‘बालशिवाजी’ हा असाच एक प्रेरणादायी चित्रपट आहे. तो बघितला नसेल, तर सुट्टीत आपल्या सर्व मित्रांना घेऊन नक्की पाहा.

---

बालशिवाजी/भारत/१९८१/मराठी/रंगीत/१२० मिनिटे

निर्माते : बाल चित्र समिती, दिग्दर्शक : प्रभाकर पेंढारकर
कथा, पटकथा व संवाद : सुधाकर घोलकर व प्रभाकर पेंढारकर
संगीत : दत्ता डावजेकर, गीते : योगेश, वसंत निनावे
संकलन : मनोहर चौबळ, सिनेमॅटोग्राफी : त्यागराज पेंढारकर
प्रमुख भूमिका : आनंद जोशी, जान्हवी खांडेकर, भालचंद्र कुलकर्णी, बापूसाहेब गावडे, माणिकराज, मधू आपटे

----


१७. तारे जमीं पर...
-----------------------

तो राजहंस एक...
---------------------

मित्रांनो, बारा वर्षांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता आमीर खान यानं निर्मिलेला व दिग्दर्शित केलेला ‘तारे जमीं पर’ हा चित्रपट खूप गाजला. तुम्ही तो पाहिलाय का? पाहिला नसेल तर या सुट्टीत आपल्या मित्रांसोबत नक्की पाहा. आपण वरकरणी इतरांपेक्षा वेगळे दिसत असलो किंवा आपल्यात काही तरी कमी आहे, असं भासत असलं, तरी त्या गोष्टीचा न्यूनगंड बाळगण्याचं कारण नसतं. आपल्याकडं काय चांगलं आहे, त्याचा शोध घ्यावा लागतो आणि जगासमोर तो अभिमानानं मिरवावा लागतो. आपण लहान असताना आपल्याला चांगला, म्हणजे आपल्यातले गुण पारखणारा शिक्षक लाभणं फार महत्त्वाचं असतं. आपल्याला पैलू पाडणारे शिक्षक मिळाले, तर आपलं आयुष्य संपूर्ण बदलून जातं.

आमीर खाननं नेमका हाच विषय घेऊन २००७ मध्ये आणला ‘तारे जमीं पर’ हा चित्रपट. हा चित्रपट तेव्हा प्रचंड गाजला. याचं कारण म्हणजे आपल्याकडच्या शिक्षणपद्धतीमध्ये असलेल्या दोषांवर या चित्रपटानं नेमकं बोट ठेवलं होतं. ईशान अवस्थी हा आठ वर्षांचा मुलगा या चित्रपटाचा नायक आहे. ईशान अभ्यासात कच्चा आहे. मात्र, त्याला चित्रे काढण्याची अत्यंत आवड आहे. त्याचे आई-वडील मात्र त्याचा हा वेगळेपणा ओळखण्यात अयशस्वी ठरतात. मोठ्या भावाप्रमाणे ईशाननेही शाळेत उत्तम गुण मिळविलेच पाहिजेत, असं त्यांना वाटत असतं. मात्र, ईशानमध्ये ‘डिसलेक्सिया’ नावाने ओळखली जाणारी एक शारीरिक स्थिती अस्तित्वात असते. यात त्याला अक्षरांचे क्रम उलटसुलट दिसत असतात. आकड्यांचंही तसंच. त्यामुळं शाळेत सगळे त्याची टर उडवत असतात. एके दिवशी त्याच्या शाळेचा निकाल पाहून त्याचे आई-वडील त्याला पाचगणीला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतात. तिथे ईशानची अवस्था आणखीनच बिकट होते. राजू दामोदरन नावाचा एक अपंग मुलगा त्याचा मित्र होतो. मात्र, ईशान आईच्या आठवणीनं व्याकुळ झालेला असतो. आता ईशानचं काही खरं नाही, असं वाटत असतानाच त्या शाळेत एका आगळ्यावेगळ्या शिक्षकांचं आगमन होतं. राम शंकर निकुंभ असं त्यांचं नाव.
हे सर नेहमीच्या शिक्षकांसारखे नसतातच मुळी. ते वर्गावर येतात तेच विदूषकाची टोपी घालून आणि गाणं म्हणत... एरवी सदैव दुर्मुखलेल्या ईशानची कळी या सरांना पाहून खुलते. निकुंभ सरांना हळूहळू ईशानविषयी समजू लागतं. ईशानचा नक्की प्रॉब्लेम काय आहे आणि त्याच्यासाठी नक्की काय केलं पाहिजे, हे त्यांना नेमकं माहिती असतं. मग निकुंभ सर ईशानमधले गुण कसे ओळखतात, त्याला नैराश्यातून कसे बाहेर काढतात, याची ही कथा आहे.
हा चित्रपट तेव्हा खूप चालला, लोकप्रिय झाला याचं कारण पाहणाऱ्या प्रत्येकाला ईशानमध्ये आपलं बालपण दिसलं. आपल्यापैकी बहुतेक जण सर्वगुणसंपन्न कधीच नसतात. आपल्यात काही ना काही त्रुटी नक्कीच असतात. मात्र, आपल्यावर सर्वोत्कृष्ट होण्याचा, उत्तम गुण मिळविण्याचा, सगळीकडं पहिलंच येण्याचा प्रचंड दबाव असतो. हा दबाव आपण सहन करू शकत नाही. यातल्या ईशानसारखीच आपली अवस्था होते. म्हणून हा चित्रपट पाहताना आपण त्या मुलाशी सहज जोडले जाऊ शकतो.
दर्शिल सफारी या मुलाने यात ईशानचं काम खूप छान केलंय. पुढचे दोन दात सशासारखे पुढं असलेला हा गोड मुलगा ईशानच्या भूमिकेत खूप सहजतेनं वावरलाय. यातलं ‘मैं कभी बतलाता नहीं, पर अंधेरे से डरता हूँ मैं माँ’ हे शंकर महादेवन यांनी गायलेलं अत्यंत अप्रतिम गाणं ऐकून ज्याचे डोळे पाणावत नाहीत, असा माणूस नसेल.
आमीरने यातील निकुंभ सरांची भूमिका फारच समरसून केलीय. आमीरचं स्टारडम त्यानं या चित्रपटापुरतं बाजूला ठेवलं. यात त्याचा प्रवेश मध्यंतराच्या आसपास होतो. मात्र, त्यानं स्वत:वर फोकस न ठेवता तो संपूर्णपणे ईशानच्या भावविश्वावरच ठेवला. त्यामुळंच चित्रपट यशस्वी झाला. ईशानच्या आई-वडिलांच्या भूमिकेत आमीरने तोवर फारसे माहिती नसलेले टिस्का चोप्रा व विपिन शर्मा या दोघांना घेतलं. त्या दोघांचा चेहरा परिचित नसणं त्यांना या भूमिकांसाठी उपयुक्तच ठरलं. दोघांच्याही कामाचं खूप कौतुक झालं.
चित्रपटाची मूळ कथा अमोल गुप्ते यांची होती. आधी या चित्रपटाचे दिग्दर्शनही आधी तेच करणार होते. मात्र, नंतर स्वत: आमीरनेच या चित्रपटाची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली. या चित्रपटातील बरेचसे चित्रिकरण पाचगणी येथील एका शाळेत झालं आहे. असा हा अतिशय सुंदर चित्रपट तुम्ही अद्याप पाहिला नसेल, तर पाहायलाच हवा. नक्की पाहा आणि आम्हालाही कळवा.

---

तारे जमीं पर/भारत/२००७/हिंदी/रंगीत/१६४ मिनिटे

निर्माता : आमीर खान, दिग्दर्शक : आमीर खान
कथा, पटकथा व संवाद : अमोल गुप्ते, संगीत : शंकर-एहसान-लॉय
गीते : प्रसून जोशी, संकलन : दीपा भाटिया
सिनेमॅटोग्राफी : सेतू (सत्यजित पांडे)
प्रमुख भूमिका : दर्शिल सफारी, आमीर खान, टिस्का चोप्रा, विपिन शर्मा

----

१८. द कप
-----------

दुनिया ‘गोल’ है...
---------------------

मुलांनो, आपण एका विशिष्ट प्रदेशात, वातावरणात राहतो. आपल्याभोवती असलेल्या नैसर्गिक गोष्टींचा आपल्यावर परिणाम होत असतो आणि त्याच वेळी आपल्या समाजात असलेल्या रुढी-परंपरा किंवा संस्कारांचाही एक परिणाम आपल्यावर होत असतो. आपण जेव्हा आपल्याकडे तयार झालेले चित्रपट पाहतो, तेव्हा त्यात आपल्याला आपल्या सभोवती असलेलं वातावरण आणि एकूणच सांस्कृतिक पर्यावरण पाहायला मिळतं. मात्र, जेव्हा आपण जगभरात तयार झालेले चित्रपट पाहतो, तेव्हा आपल्याला या वातावरणापेक्षा भिन्न स्थितीत राहत असलेल्या लोकांबद्दल कळतं. त्यांचं जगणं, ते राहतात तो भूभाग, तिथलं पर्यावरण आणि त्यांची सांस्कृतिक जडणघडण आपल्यापेक्षा वेगळी असते. अशा जगभरातील विविध प्रदेशांत राहणाऱ्या लोकांची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. ‘हे विश्वचि माझे घर’ हा भाव आपल्यात निर्माण होण्यास यामुळे मदत होते. जगभरात विविध भाषा बोलल्या जात असल्या, किंवा धार्मिक वा सांस्कृतिक धारणा वेगवेगळ्या असल्या, तरी प्रेम, विश्वास, राग, लोभ, मत्सर अशांसारख्या काही मूलभूत भावना जगभरात एकच आहेत, हे आपल्या लक्षात येतं. एकूणच जग समजावून घेण्यासाठी मदत होते आणि आपला दृष्टिकोन विशाल, उदार होतो. जागतिक सिनेमा पाहायचा तो यासाठीच. 

‘द कप’ हा चित्रपट तुम्ही यासाठी नक्की पाहा. भुतान या भारताच्या शेजारच्या चिमुकल्या देशाचा हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटातील भाषा तिबेटी आहे. बौद्ध धर्माचे मठ असतात व तिथे लहान मुलांना भिख्खू म्हणून शिक्षण घेण्यासाठी ठेवतात. तिबेटमधील अनेक लोक भारतात येऊन राहतात. भारतातील अशाच एका मठात या चित्रपटाची कहाणी घडते. फुटबॉल हा जगभरातील सर्वांत लोकप्रिय खेळ. सन १९९८ मध्ये या फुटबॉलचा वर्ल्ड कप फ्रान्समध्ये भरला होता. या स्पर्धेची पार्श्वभूमी या चित्रपटाला आहे.
मठातलं वातावरण मोठ्या शिस्तीचं असतं. तिथं शिकायला राहणाऱ्या मुलांना बाहेरच्या जगाशी अजिबात संपर्क साधता येत नाही. तिथल्या अत्यंत कडक शिक्षकांच्या पहाऱ्यात त्यांना अभ्यास करावा लागतो. मात्र, कितीही कडेकोट बंदोबस्त असला, तरी बाहेरच्या जगातील झुळुका तिथं येत असतातच. त्यामुळं फुटबॉल वर्ल्ड कपची चर्चा हळूहळू या मठातील मुलांमध्येही सुरू होतेच. त्यातही ऑर्ग्येन आणि लोडो या दोन मुलांचं फुटबॉलप्रेम विशेष असतं. गेको या मठातील प्रमुख पर्यवेक्षकाला ऑर्ग्येन आणि लोडोचं हे बेशिस्त वागणं अजिबात आवडत नसतं. मात्र, तरीही एकदा त्याचा डोळा चुकवून ही दोन मुलं मठाच्या बाहेर पडून, टीव्हीवर चोरून फुटबॉलची मॅच बघून येतात. त्या वर्षी ब्राझील आणि फ्रान्स हे दोन संघ अंतिम फेरीत येतात. ही फायनल मॅच टीव्हीवर लाइव्ह बघण्याची इच्छा या मुलांमध्ये जागृत होते. काहीही करून मठातच टीव्ही आणून हा सामना बघायचाच, असा निश्चय ही मुलं करतात. त्यासाठी ते मठाच्या प्रमुखांनाच साकडं घालतात. आश्चर्य म्हणजे, त्यांची ही मागणी मान्य होते. मात्र, मठात बाहेरून टीव्ही आणायचा कसा आणि थेट प्रक्षेपण पाहायचं कसं, असा प्रश्न या मुलांसमोर असतो. त्यावर ते कशी मात करतात, याची रंजक कहाणी या चित्रपटात आहे.
या कथाभागावरून आपल्या असं लक्षात येईल, की या अशा काही मूलभूत भावना जगभरात सारख्याच असतात. त्यांना कुठल्याही बंधनात अडकवून ठेवता येत नाही. आपल्या मूळ देशापासून दूर, निर्वासितांसारखं जगणं जगत असताना या मठातील सर्व मुलांना तिकडं दूर युरोपात सुरू असलेल्या फुटबॉल स्पर्धेविषयी प्रचंड आकर्षण वाटतं. खेळ माणसांना जोडतो म्हणतात ते असं! एका अर्थानं दुनिया ‘गोल’ है... हे सत्य या सिनेमात सर्व तऱ्हेनं सिद्ध होतं. या चित्रपटाचा दिग्दर्शक ख्येन्त्से नोर्बू हा स्वत: एका तिबेटी मठात ‘लामा’ (धर्मगुरू) म्हणून काम करीत होता. त्याला सिनेमाचं वेड होतं. त्यानं नंतर न्यूयॉर्कमधील चित्रपट विद्यालयात जाऊन सिनेमाविषयक शिक्षण घेतलं. सिनेमाविषयीच्या या आत्यंतिक वेडातूनच त्यानं भुतानचा पहिलावहिला चित्रपट तयार केला. एका अर्थानं हा ‘द कप’ चित्रपट म्हणजे या दिग्दर्शकालाही मिळालेला ‘कप’च आहे. या चित्रपटाचं जगभरातून स्वागत झालं. अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांतून तो दाखविला गेला. तुम्हीही नक्की पाहा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा... 

---

द कप/भुतान/१९९९/तिबेटी/रंगीत/९३ मिनिटे

निर्माते : जेरेमी थॉमस, रेमंड स्टेइनर, माल्कम वॉटसन
कथा व दिग्दर्शक : ख्येन्त्से नोर्बू
प्रमुख भूमिका : ऑर्ग्येन टोबग्याल, नेतेन चोकलिंग, जामयांग लोड्रो

----

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----

No comments:

Post a Comment