26 Dec 2021

‘८३’च्या निमित्ताने....

ते फक्त क्रिकेट नव्हतं...
-----------------------------



काल शनिवारी ‘८३’ बघितला. भारताने १९८३ मध्ये कपिल देवच्या जिगरबाज नेतृत्वाखाली जिंकलेल्या पहिल्यावहिल्या वन डे वर्ल्ड कपच्या यशोगाथेची कहाणी सांगणारा हा कबीर खान दिग्दर्शित चित्रपट. तो बघताना अनेकदा डोळे पाणावले. हृदय उचंबळून आलं. देशप्रेमाच्या भावनेनं मन ओथंबून गेलं. सिनेमा संपला, तरी किती तरी वेळ हा प्रभाव टिकून राहिला. मग पुन:पुन्हा त्या अंतिम सामन्याची क्षणचित्रं यू-ट्यूबवर बघितली. परत परत तो अपार जल्लोष, ती उत्कट विजयी भावना मनात साठवून घेतली. 
मला हा सिनेमा एवढं भावण्याचं आणखी एक वैयक्तिक कारण आहे. ते म्हणजे, मी १९८३ मध्ये सात-आठ वर्षांचा होतो, तरी मला हा वर्ल्ड कप बिलकुलच आठवत नाही. मला १९८१ च्या घटना आठवतात. महंमद अझरुद्दीननं हैदराबादकडून रणजी स्पर्धेत १५१ धावा केल्याची बातमी पेपरमध्ये वाचल्याचं मला लख्ख आठवतं. मला १९८२ ची एशियाड स्पर्धा अंधुक अंधुक आठवते. १९८४ नंतरच्या तर सर्वच घटना नीट आठवतात. १९८३ चा वर्ल्ड कप मात्र अजिबात आठवत नाही. मी तेव्हा तिसरीत गेलो होतो. जूनमध्ये शाळा नुकतीच सुरू झाली असणार. तेव्हा या वर्ल्ड कपची चर्चा आजूबाजूला होत असणारच. पेपर तर मी रोज वाचायचो. टीव्ही फार नव्हते, पण आजोबांना रेडिओवर कॉमेंटरी ऐकायची सवय होती. हे सगळं असूनही माझ्या स्मरणाच्या हार्ड डिस्कमधून वर्ल्ड कपची फाइल कायमची उडालेली आहे. या गोष्टीची मला निरंतर खंत वाटत आलेली आहे. मला १९८७ चा वर्ल्ड कप व्यवस्थितच आठवतो. इतकंच काय, तर १९८५ चा ऑस्ट्रेलियात झालेला बेन्सन अँड हेजेस मिनी वर्ल्ड कप आणि त्यात फायनलमध्ये आपण पाकिस्तानला धूळ चारून मिळविलेलं अजिंक्यपद, शास्त्रीला मिळालेली ऑडी हे सगळं आठवतं. पण १९८३ मात्र... टोटल ब्लँक! त्यामुळं ‘८३’ या सिनेमानं मला माझ्या आयुष्यातून कायमचे हरवलेले ते क्षण पुन्हा जगण्याची संधी दिली. सिनेमात नाट्यरूपानं का होईना, ते सगळं पुन्हा पाहता आलं, ते वातावरण अनुभवता आलं आणि म्हणूनच हा सिनेमा मला एवढा भिडला. (याच कारणामुळं मला या सिनेमाचं परीक्षण लिहिता येणार नाही.)
कबीर खाननं ‘८३’ सिनेमा अगदी ‘दिल से’ तयार केला आहे, हे त्या सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये जाणवतं. खरं सांगायचं तर या सिनेमाचा ट्रेलर मी प्रथम पाहिला तेव्हा मला तो काही तितकासा भावला नव्हता. अगदी रणवीरसिंहही कपिल म्हणून पटला नव्हता. इतर खेळाडू तर सोडूनच द्या! मात्र, त्यामुळंच मी अगदी किमान अपेक्षा ठेवून हा सिनेमा पाहायला गेलो होतो. त्या तुलनेत तो खूपच उजवा निघाला आणि अंत:करणापर्यंत पोचला. 
हा सिनेमा अर्थातच केवळ वर्ल्ड कपमधल्या त्या विजयापुरता नाही. तो अर्थातच केवळ क्रिकेटपुरताही नाही. भारताला जागतिक स्तरावर एक ताकद म्हणून ओळख मिळवून देणारी, देशवासीयांचा स्वाभिमान जागविणारी, पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणारी अशी ती एक ऐतिहासिक घटना होती. म्हणूनच कबीर खाननं चित्रपटाच्या सुरुवातीलाच त्या काळात आजूबाजूला घडत असलेल्या घटनांचे सूचक उल्लेख करून आपल्याला त्या काळात नेलंय. फूलनदेवी आणि नवाबपूरची दंगल हे त्यातले ठळक उल्लेख. 
भारतीय क्रिकेट मंडळ आणि तेव्हाच्या क्रिकेटपटूंची एकूणच सांपत्तिक स्थिती, क्रिकेटच्या जगात, त्यातही वन डे क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं असलेलं स्थान, स्वातंत्र्य मिळून ३५ वर्षं झाली तरी इंग्लंडबाबत मनात असलेली ‘साहेबाचा देश’ ही मानसिकता, इंग्लिश क्रिकेट बोर्ड आणि एकूणच तेथील पत्रकार, सर्वसामान्य यांच्या मनात भारताबद्दल असलेली तुच्छतावादी मानसिकता, वेस्ट इंडिजच्या संघाचा तेव्हा असलेला प्रचंड दबदबा, आपले क्रिकेटपटू आणि त्यांचे कुटुंबीय, आपल्या संघाचे उत्साही आणि धडाकेबाज मॅनेजर मानसिंह असे सगळे बारकावे आणि व्यक्तिरेखा कबीर खाननं अगदी बारकाईनं टिपल्या आहेत. 

सिनेमाचा सगळा भर हा आपल्या संघाने इंग्लंडमध्ये पोचल्यापासून ते वर्ल्ड कप जिंकेपर्यंत खेळलेला प्रत्येक सामना आणि त्याच्या आगेमागे ड्रेसिंग रूममध्ये आणि मैदानावर घडत असलेल्या घटना यावरच केंद्रित आहे. त्यातही टनब्रिज वेल्सच्या मैदानावर कपिलने झिंबाब्वेविरुद्ध मारलेलं जबरदस्त शतक आणि १७५ धावा करून मोडलेला ग्लेन टर्नरचा विश्वविक्रम हा सर्वच घटनाक्रम अत्यंत प्रभावी झाला आहे. कपिल आणि सुनील यांच्यात असलेली काहीशी तेढ, श्रीकांतचा गमत्या स्वभाव, इंग्लंडच्या राणीला भेटण्याचा प्रसंग, श्रीकांत व कपिलला एका साउथ इंडियन कुटुंबाकडून भोजनाचं आलेलं आमंत्रण व त्यांच्या घरातील प्रसंग, नंतर ब्रिटिश राजदूतांच्या पार्टीतील श्रीकांतचं जोरदार भाषण, संदीप व रवी शास्त्री यांना आणि तीन-चार जणांसह रात्री मजा करायला बाहेर जायचं असतं तेव्हा कपिल त्यांना सल्ला देतो तो प्रसंग, गावसकरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून वगळण्याचा प्रसंग, वेंगसरकरचा जबडा मोडून तो वर्ल्ड कपला मुकण्याचा प्रसंग, इंग्लंडला हरवल्यानंतर भारतीय चाहत्यांना ढोल वाजवू न देणाऱ्या त्यांच्या उद्धट प्रेक्षकांना भारतीय प्रेक्षकांनी ठोकणं अशा अनेक घटनांच्या साखळीतून वर्ल्ड कपच्या मोहिमेचा हा थरार आपल्यासमोर उलगडत जातो.
भारतीय संघाला या स्पर्धेला जाण्यापूर्वी कुणीही फार मोजत नव्हतं, हे आता सर्वश्रुत आहे. या सिनेमातही ठायी ठायी त्याचा प्रत्यय देणारे प्रसंग आहेत. भारतीय संघाला लॉर्ड्सचे पासच दिलेले नसतात. मॅनेजर मानसिंह हे पासेस मागायला जातात, तेव्हा उद्धट इंग्रज अधिकारी ‘भारताची एकही मॅच लॉर्ड्सला नाही, तुमचा संघ फायनलला गेला तर नक्की पास देऊ’ असं सांगतो. त्यानंतरच्या प्रसंगात मानसिंह त्याच अधिकाऱ्याकडे पुन्हा जातात तेव्हा थिएटरमध्ये एकच जल्लोष होतो, हे सांगणे न लगे. इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय पाठीराख्यांचाही एक समांतर ट्रॅक या सिनेमात आहे. त्यातही एक लहान मुलगा आणि त्याचे वडील हे जणू काही समस्त भारतीय प्रेक्षकांचे प्रतिनिधी म्हणून सिनेमाभर दिसत राहतात. या मुलाच्या हातातील तिरंग्यामुळंच कपिल आणि त्याच्या संघाला प्रेरणा मिळते. 
कपिलला व्यवस्थित इंग्लिश बोलता येत नसतं. या मुद्द्याचाही सिनेमात अनेकदा उल्लेख येतो. त्या अनुषंगाने कपिलची पहिली प्रेस कॉन्फरन्स आणि तिथं असलेले दोन-तीन पत्रकार आणि फायनलपूर्वीची भरगच्च प्रेस कॉन्फरन्स आणि तिथंही पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्या आत्मविश्वासानं ‘वी आर हिअर टु विन’ असं कपिल म्हणतो, त्याच आत्मविश्वासानं हेच वाक्य ऐकवणारा कपिल बघताना डोळे भरून न आले तरच नवल. 
भारतीय संघाच्या बसमध्ये मानसिंह कपिलला ‘टीम मीटिंग’ घ्यायला सांगतात, तो प्रसंगही असाच जमून आलाय. त्या बसमध्ये रंगीत टीव्ही असतो आणि व्हीसीआरवर लागलेलं ‘हम बन तुम बने एक दुजे के लिए’ हे गाणं आणि त्या गाण्यातील ‘आय डोण्ट नो व्हॉट यू से’ या ओळींचा विनोदासाठी केलेला चपखल वापर यासाठी दिग्दर्शकाला आपली दाद जातेच. तसंच बहुतेक सामन्यांची प्रत्यक्ष दृश्यं आणि त्यात खऱ्या सामन्यातला एखादा फोटो आणि टीव्हीवर दिसणारा सामन्यात मूळ सामन्याचीच ध्वनिफीत वापरणं अशा काही युक्त्यांनी मजा येते.
भारतीय संघ या वर्ल्ड कपपूर्वी आधीच्या दोन वर्ल्ड कपमध्ये केवळ एक सामना जिंकू शकला होता. तोही ईस्ट आफ्रिकेविरुद्ध. मात्र, १९८३ च्या वर्ल्ड कपनं भारतीय क्रिकेट आरपार बदलून गेलं. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्र्यांचा एक प्रसंग सिनेमात आहे. नवाबपूरच्या दंगली थांबविण्यासाठी पंतप्रधानांनी क्रिकेटज्वराचा उपयोग करून घेतला, असं त्यात सूचित करण्यात आलंय. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोचल्यानंतरच खऱ्या अर्थानं भारतात माध्यमांनी (म्हणजे वृत्तपत्रंच!) या स्पर्धेचं जोरदार वार्तांकन सुरू केलं आणि सर्वसामान्य जनतेतही स्पर्धेची चर्चा सुरू झाली. मग होस्टेलवर वर्गणी काढून टीव्ही आणले गेले. गावोगावी अँटिने बसविले गेले. ‘पिक्चर दिसतंय का?’ हा अँटेना हलवून विचारायचा प्रश्न सर्व देशभरात विचारला जाऊ लागला. सिनेमात हे सगळं क्रिकेटचं वाढतं प्रेम चढत्या भाजणीनं दाखवण्यात आलंय. भारतानं पहिला सामना वेस्ट इंडिजविरुद्ध जिंकला, तरी ‘भारत नशिबानं जिंकला’ असं लिहिणाऱ्या इंग्लिश वृत्तपत्रांच्या पानांनी कपिल बूट साफ करत बसतो, हे दृश्य फारच बोलकं! (भारत जिंकला तर I will eat my words म्हणणारा समीक्षक भारतानं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर शेवटी महिन्यानंतर चक्क त्यानं लिहिलेला लेख पाण्यात (की दारूत?) बुडवून खातो, याचाही उल्लेख सिनेमाच्या शेवटी येतो.) थोडक्यात, सर्वांच्या नाकावर टिच्चून भारतानं, विशेषत: कपिलनं आपल्या जिगरी वृत्तीच्या बळावर हा वर्ल्ड कप खेचून आणला होता. या मूळ घटनेतच इतकं नाट्य आहे, की त्यावर गेली ३८ वर्षं चित्रपट तयार कसा झाला नाही, याचंच आश्चर्य वाटतं. करोनापूर्व काळातच तयार झालेला हा सिनेमा प्रदर्शित व्हायला अखेर जवळपास दोन वर्षं जावी लागली. मात्र, हा सिनेमा बघण्याची मज्जा मोठ्या पडद्यावरच, यात काही वाद नाही.

अखेर कलाकारांविषयी. रणवीरसिंह कपिल म्हणून शोभत नाही, हे ट्रेलर बघून झालेलं माझं मत सिनेमा बघितल्यानंतर पूर्ण पुसलं गेलं. त्यानं फारच मेहनतीनं ही भूमिका साकारली आहे, यात वाद नाही. श्रीकांत झालेला जिवा हा अभिनेता मजा आणतो. पंकज त्रिपाठीनं मानसिंहच्या भूमिकेत हा सिनेमा अक्षरश: तोलून धरला आहे. आदिनाथ कोठारेला दिलीप वेंगसरकरांची छोटीशी भूमिका करण्याची संधी मिळाली आहे. सुनील गावसकर झालेला ताहिर भसीन मुळीच गावसकर वाटत नाही. पण त्यानं काम चांगलं केलंय. बाकी बलविंदर संधूचं काम करणाऱ्या कलाकारानं (बहुतेक अॅमी विर्क असं नाव आहे) पण लक्षात राहण्यासारखं काम केलंय. नीना गुप्तानं कपिलच्या आईचं काम सुंदर केलंय. इतर संघांचे खेळाडू (जसेच्या तसे दिसणारे) मिळणं अवघडच. त्यातल्या त्यात व्हिव रिचर्ड्सला जरा वाव आहे. तो कलाकारही बराचसा रिचर्ड्ससारखा दिसणारा निवडला आहे. दीपिका पदुकोणनं कपिलच्या पत्नीची - रोमीची छोटी भूमिका साकारली आहे. अंतिम सामन्यापूर्वी सकाळी लॉर्डसवरचा सूर्योदय पाहत तिचं आणि कपिलचं संभाषण हा या सिनेमाचा एक हायपॉइंट आहे. त्याच सकाळी लॉर्ड्सवर तिरंगा वर वर जातानाचं दृश्य पाहताना डोळे वाहिल्याशिवाय राहत नाहीत. चित्रपटातली दोन-तीन गाणीही स्फूर्तिदायी आहेत. 
भारतामधल्या क्रिकेटचं भवितव्य कायमचं बदलवून टाकणारी या स्फूर्तिदायी यशोगाथा पाहायला हवीच. क्रिकेट न आवडणाऱ्यांनीही जरूर पाहावा, तसंच आपल्या लहान मुलांना आवर्जून दाखवावा असाच हा चित्रपट आहे.

---

याच शीर्षकाचा माझा आणखी एक लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

19 Dec 2021

पुणे मेट्रो लेख

मेट्रोच्या बोगद्यात...
-----------------------

जगातल्या सर्व गोष्टींविषयी मला कुतूहल वाटतं. माझ्या पेशाला पूरक अशीच ही गोष्ट आहे. आपल्या आजूबाजूला काय चाललंय ते जाणून घ्यावं, असं सतत वाटत असतं. नवीन काही निर्माण झालं, की शक्य होईल तेवढ्या लवकर त्या ठिकाणाला भेट देणं मला आवडतं.
पुणे मेट्रोचं काम सुरू झाल्यापासून मला त्या कामाविषयी कुतूहल आहे. मी येता-जाता त्या कामाची प्रगती बघत असतो. स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट हा पिंपरी ते स्वारगेट या लाइनचा भाग अंडरग्राउंड आहे. हे काम बघण्याचा योग शनिवारी आला. सहकारी सुनीत भावे पूर्वीपासून मेट्रोशी संबंधित सर्व बातम्या बघतो. त्याच्यामुळं ऑफिसातल्या काही सहकाऱ्यांना मेट्रोचं काम बघता आलं. पूर्वीही काही जण गेले होते, तेव्हा मला जमलं नव्हतं. मात्र, या शनिवारी जमवलंच. मग अभिजित थिटे, चैत्राली चांदोरकर, विहंग घाटे आणि मी असे आम्ही चौघं हे काम बघायला दुपारी बारा वाजता स्वारगेटला पोचलो. स्वारगेटकडून सारसबागेकडं येताना पाणीपुरवठा केंद्राच्या अलीकडं मेट्रोचं मोठं गेट लागतं. तिथून आत गेल्यावर तिथल्या जनसंपर्क अधिकारी अर्चना यांनी आमचं स्वागत केलं.

प्रत्येकाला शूज कम्पलसरी होते. याशिवाय तिथं गेल्यावर हेल्मेट आणि रेडियमचं जॅकेट आम्हाला घालायला दिलं. बोगद्यापर्यंत खाली जायला एखादी लिफ्ट असेल असं वाटलं होतं. प्रत्यक्षात लोखंडी सांगाड्याचा एक तात्पुरता जिना तिथं उभारला आहे. या जिन्यात एका वेळी पाचच लोकांना खाली किंवा वर जाता येतं. आम्ही तो जिना उतरू लागलो, तेव्हा तिथले काही कामगार वर येताना दिसले. दोन माणसं जेमतेम जाऊ शकतील, अशा रुंदीच्या त्या जिन्यानं आम्ही खाली खाली जात होतो. जवळपास तीस मीटर म्हणजे दहा मजले एवढं खाली आम्ही गेलो. वरून पाहिलं तर खाली एवढं काम सुरू आहे हे समजतही नाही. आम्ही खाली पोचल्यावरच त्या कामाच्या भव्यतेचा अंदाज आला. डाव्या बाजूला मेट्रोच्या स्टेशनची इमारत आकार घेत होती. तिथं एकूण चार मजले दिसत होते. आम्हाला तिकडं न जाता उजवीकडं म्हणजे बोगद्याकडं जायचं होतं. तिथं सुरुवातीला एक केबिन होती. तिथल्या रजिस्टरमध्ये आम्ही आमची नावं व येण्याची वेळ नोंदविली. अर्चना यांनी आम्हाला प्राथमिक माहिती दिली व नंतर युवराज गावंडे हे तेथील काम पाहणारे इंजिनीअर आमच्यासोबत आले. त्यांनीच आम्हाला नंतर सगळी माहिती दिली. बोगद्याच्या सुरुवातीची जागा खूपच मोठी होती. मधोमध दोन ठिकाणी रुळ टाकले होते. त्यावरून ट्रॉलीची ये-जा सुरू होती. बोगद्याच्या आत बसवायच्या सिमेंट-काँक्रिट रिंग वाहून नेण्याचं आणि टीबीएमनं बोगदा खणल्यावर निघालेली माती आणून टाकायचं काम या ट्रॉल्या करीत होत्या. स्वारगेट हे शेवटचं स्टेशन असल्यानं इथं रुळ बरेच क्रिस-क्रॉस होणार आहेत. त्यामुळं हा सुरुवातीचा भाग बराच रुंद होता. इथून दोन वेगवेगळ्या बोगद्यांतून मेट्रो सिव्हिल कोर्टाकडे (म्हणजेच मंडई, बुधवार चौकाकडे) जाणार आहे आणि तिथून येणार आहे. स्वारगेटवरून मंडईकडे जाणाऱ्या लाइनला डाउन लाइन म्हणतात, तर तिकडून इकडे येणाऱ्या लाइनला अप लाइन म्हणतात. अप लाइनच्या बोगद्याचं खोदकाम जवळपास एक किलोमीटरहून अधिक झालं आहे.
(मंडईपर्यंतचं अंतर साधारण दोन किलोमीटर २०० मीटर एवढं आहे.) सिव्हिल कोर्टकडून खणत येणारं टीबीएम आणि इकडून तिकडं खणत जाणारं टीबीएम यांचं जंक्शन बुधवार चौक (फडके हौद स्टेशन) इथं आहे. अप लाइनचं मशिन एक किलोमीटरहून दूर असल्यानं युवराज यांनी आम्हाला डाउन लाइनवरचं मशिन दाखवायला न्यायचं ठरवलं. हे मशिन साधारण पाचशे मीटरपर्यंत दूर खणत गेलं होतं. आम्ही त्या बोगद्यात शिरलो. तो बोगदा अगदी व्यवस्थित तयार झालाय. शेजारून (त्या जिन्यासारखीच) एक तात्पुरती लोखंडी पट्ट्यांची लाइन चालत जाणाऱ्यांसाठी केली आहे. आम्ही त्या पट्टीवरून चालत निघालो. थोडं आत गेल्यावर जरा घाम जाणवू लागला. आम्ही खरं तर फार खोल आलो नव्हतो, तरी बोगद्यात आत आत चाललो आहोत या जाणिवेनं थोडीशी भीती वाटली. अर्थात तिथं सर्व सुरक्षा व्यवस्था (पुरेसे दिवे, ऑक्सिजन इ.) चोख होती आणि महत्त्वाचं म्हणजे टीबीएम बघायची उत्सुकता फार होती. आत आत जाऊ लागलो तशी थोडी धाप लागू लागली. (ज्यांना श्वासांचा किंवा दम्याचा वगैरे त्रास आहे, त्यांना इथं येणं जरा अवघडच जाईल.) आम्ही आमचे स्वेटर, जर्किन काढून टाकली. त्यांचं ते हेल्मेट वर होतंच. शिवाय मास्क. त्यामुळं नंतर मास्कही काढून टाकला. आता जरा नीट श्वास घेऊन चालता यायला लागलं.
अखेर (आमच्या दृष्टीनं) बरीच पायपीट केल्यावर यंत्राचा आवाज येऊ लागला. लाइट दिसू लागले. सुरुवातीला रेल्वेच्या इंजिनासारखं एक युनिट लागलं. तिथं आत अनेक कम्प्युटर आणि डिस्प्ले होते. समोर चाललेलं सगळं काम आणि त्याचे तपशील तिथं दिसत होते. सीसीटीव्ही कॅमेरे होते. या केबिनमध्ये एसी होता. त्यामुळं तिथं शिरताच एकदम बरं वाटलं. हे विचार, ते विचार असं करून थोडा जास्तच वेळ आम्ही तिथं उभे राहिलो आणि जरा गार झालो. (बाकी हे सगळं अवाढव्य काम बघून तसेही गारच झालो होतो म्हणा...) हे टीबीएम ‘टेराटेक’ नावाच्या ऑस्ट्रेलियन कंपनीचं असलं, तरी ते चीनमध्ये तयार झालं आहे. त्या इंजिनासारख्या दिसणाऱ्या युनिटमधून एक ट्रॉली मागे जाताना दिसली. खणल्यावर बाहेर पडणारा सगळा राडारोडा वरून सिमेंट मिक्सरसारख्या मोठ्या भांड्यातून खाली एकेका ट्रॉलीत पडत होता. नंतर ही ट्रॉली त्याच रुळांवरून मागे जात बोगद्यातून बाहेर जात होती. हा सगळा टीबीएमचाच भाग होता असं कळलं. मला ते यंत्र म्हणजे एकच युनिट असेल असं वाटत होतं. पण ते समोर गोल फिरणारं कटर हा त्या महाकाय यंत्राचा केवळ एक भाग होता, असं कळलं. त्या कटरपर्यंत तर आपल्या पोचताच येत नाही. त्याच्यामागे सिमेंटच्या रिंग गोलाकार बसवण्याचं काम यंत्राच्या साह्यानं सुरू होतं. हे कामही ऑटोमॅटिक होतं. फक्त दोन रिंग जोडणारे मोठाले स्क्रू यंत्रानं पिळण्याचं काम कर्मचारी करतात. अशी एकेक रिंग बसवत हे मशिन पुढं जातं. दिवसाला साधारण आठ ते दहा मीटर खोदाई करून रिंग बसवल्या जातात. आम्ही गेलो तेव्हा ५५३ वी रिंग बसविली जात होती. (म्हणजेच साधारण ५०० ते ५५० मीटर अंतर मशिननं पार केलं होतं.) आपण आत्ता साधारण कुठे आहोत, असं अभिजितनं विचारलं. तेव्हा साधारण खडक पोलिस स्टेशनच्या आसपास (म्हणजे त्या जागेच्या खाली) आपण आहोत, असं समजलं. गंमत वाटली. आपल्या डोक्यावर आख्खं शहर, रस्ते, तुफान रहदारी आहे, या कल्पनेनं थरारून जायला झालं. इथं २४ बाय ७ सतत काम सुरू असतं, असं युवराज सांगत होते. आठ आठ तासांची शिफ्ट असते. तरीही हे कर्मचारी तिथं एवढ्या उकाड्यात आणि थोड्या कमी ऑक्सिजनमध्ये काम करताहेत हे बघून कमालच वाटली. हे काम साधारणपणे सहा महिन्यांत, तर शेजारच्या अप लाइनचं काम पुढील तीन महिन्यांत पूर्ण करण्याचं ‘महामेट्रो’चं नियोजन आहे. 

सगळं काम बघितलं, फोटो काढले आणि मागं फिरलो. परत येताना बोगद्याच्या बाहेरचा प्रकाश दिसला आणि हायसं वाटलं. तिथं प्रचंडच पाणी गळत होतं. पुण्यात भूजलपातळी अगदी चांगली आहे. जरा खणलं, की पाणी लागतंच. इथं तर शेजारून कालवाही जातो. हे पाणी नंतर वॉटरप्रूफिंग तंत्रानं बंद करणार आहेत. बाहेर पडताना पुन्हा एकदा वेळ नोंदविली आणि तिथून निघालो. अगदी दारात एक छोटंसं मंदिर असल्याचं दिसलं. हे आत जाताना मगाशी दिसलं नव्हतं. तिथंही फोटो काढले. आता पुन्हा त्या तात्पुरत्या जिन्याने दहा मजले वर जायचं होतं. शेजारी चार मजली स्टेशन आकाराला येत होतं. जिने चढून वर आलो, तेव्हा ऊन चांगलंच जाणवत होतं. तो सगळा एरिया केवढा मोठा आहे, याचा आता नीट अंदाज आला. स्वारगेट हे मल्टिमोडल हब असणार आहे. इथं पीएमपी, एसटी आणि मेट्रो यांना एकाच छताखाली आणण्यात येणार आहे.
बाहेर पडलो. वरच्या बाजूला त्यांचं छोटंसं ऑफिस आहे. तिथं गेलो. चहा झाला. समोर मेट्रोचे नकाशे लावले होते. साइड व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, एलिव्हेशन बघून इंजिनीअरिंगचे दिवस आठवले. समोर एका नकाशावर सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांचा फोटो होता. ते माझ्याकडंच बघताहेत असा भास झाला आणि मी मनोमन चेहरा झाकूनच घेतला.
त्या सग‌ळ्या जगड्व्याळ पसाऱ्याला आणि हे काम उभं करणाऱ्या सर्व कर्मचारी, अधिकारी आणि अभियंत्यांना नमस्कार केला आणि तिथून निघालो...


---

याआधी मेट्रोवर लिहिलेला लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा...

---





29 Nov 2021

अक्षरदान दिवाळी अंक २०२१ - लेख

लेखणी मेकअप करते तेव्हा...
-----------------------------------

चित्रपटकला आणि लेखक किंवा साहित्यिक यांचा संबंध या कलेच्या सुरुवातीपासूनच आहे. चित्रपटकला ही विसाव्या शतकाची देणगी. आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञानाच्या आविष्कारामुळे ही कला जन्माला आली. लेखन किंवा सर्जनाची प्रक्रिया मात्र त्यापूर्वी किती तरी वर्षांपासून चालत आलेली आहे. तेव्हा चित्रपटात काम करणारे साहित्यिक किंवा लेखक यांचा संबंध किती घनिष्ठ असेल, याची कल्पना आपण करू शकतो. लेखकांनी कथा लिहायची, दिग्दर्शकांनी चांगल्या अभिनेत्यांना घेऊन सिनेमा तयार करायचा अशी सर्वसाधारण पद्धत. अभिनय करता येणे ही अगदीच वेगळी कला आहे. त्यासाठी वेगळी प्रतिभा लागते. तीच गोष्ट लेखनकलेची. मात्र, या दोन्ही कला प्रसन्न असलेले काही थोर कलावंत आपल्याकडे होऊन गेले. त्यामुळे त्यांनी सिनेमा लिहिला पण आणि त्यात काम पण केले. याशिवाय पाहुणे कलाकार म्हणून झळकणारे लेखक, साहित्यिक तर आहेतच.

मराठीत सर्वांत प्रथम नाव आठवतं ते पु. ल. देशपांडे यांचं. पु. ल. अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे प्रतिभावान कलाकार होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चित्रपट क्षेत्रात आपलं नशीब आजमावलं. 'गुळाचा गणपती' हा सबकुछ पु. ल. चित्रपट होता. यात पुलंचीच कथा होती, पटकथा होती, संगीतही होतं आणि नायकाची भूमिकाही त्यांनी केली होती. याखेरीज पु. ल. आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई यांनी नायक-नायिका म्हणून वंदे मातरम् या चित्रपटात सुरुवातीला काम केलं होतं. पुलंनी तर अनेक नाटकांत, चित्रपटांत भूमिका केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी हे क्षेत्र सोडलं आणि ते लेखक म्हणून अधिक नावारूपाला आले. त्यानंतर दीर्घ काळाने त्यांनी एक होता विदूषक (१९९३) या चित्रपटासाठी पुन्हा पटकथा लेखन केलं होतं.

आचार्य अत्रे हेदेखील असेच बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्व. त्यांनी अनेक नाटके लिहिली, चित्रपट केले. मात्र, त्यांनी स्वतः व्यावसायिक भूमिका कधी केल्या नाहीत. मात्र, श्यामची आई या चित्रपटात त्यांनी चक्क प्रबोधनकार ठाकरे यांना झळकावलं होतं. यात प्रबोधनकार अगदी छोट्या भूमिकेत दिसले होते.

ग. दि. माडगूळकर म्हणजे महाराष्ट्राचे महाकवी. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक चित्रपटांसाठी पटकथा लेखन, गीतलेखन केलं. अगदी सुरुवातीला मा. विनायक यांच्या ब्रह्मचारी या चित्रपटात त्यांनी एक छोटी भूमिका केली होती. याशिवाय १९४७ मध्ये आलेल्या लोकशाहीर रामजोशी या चित्रपटातही त्यांनी अगदी लहान भूमिका केली होती. मात्र, वऱ्हाडी आणि वाजंत्री या चित्रपटात त्यांना प्रमुख भूमिका करताना रसिकांनी बघितलं, तेव्हा त्यांना सुखद धक्का बसला होता. गदिमांनी यातील कन्नड माणसाच्या विनोदी भूमिकेत धमाल केली होती. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट व पेडगावचे शहाणे या चित्रपटांतही गदिमांनी भूमिका केल्या होत्या. वऱ्हाडी आणि वाजंत्री चित्रपटात दिग्दर्शक राजदत्त यांनी शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार या तेव्हाच्या प्रसिद्ध लेखकत्रयीला पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत झळकवलं होतं. द. मा. मिरासदार यांनी अनेक चित्रपटांचं पटकथा लेखन केलं. त्यापैकी 'एक डाव भुताचा' या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी स्वतः हेडमास्तरची भूमिका केली होती, हे अनेक चित्ररसिकांच्या स्मरणात असेल. 'द. मां.'चे नुकतेच निधन झाले, तेव्हाही या आठवणींना उजाळा मिळाला होता.

वास्तविक, ना. सी. फडके, पु. भा. भावे, वसंत कानेटकर ही सर्वच लेखकमंडळी दिसायला देखणी व रुबाबदार होती. मात्र, त्यांनी त्या काळात चित्रपटात किंवा नाटकात कुठे काम केल्याची नोंद नाही. क्वचित केल्याच असतील, तर हौशी भूमिका एखाद्या प्रयोगात केल्याही असतील. मात्र,  पु. ल. देशपांडे व ग. दि. माडगूळकर हे दोघेही याला सणसणीत अपवाद ठरले. पुढे दादा कोंडके यांनी हा वारसा चालविला. दादा हे रूढार्थाने प्रस्थापित लेखक नसले, तरी शाहीर होते. ते स्वतः उत्तम गीते लिहीत असत. त्यांच्या चित्रपटांतील द्व्यअर्थी संवाद व गाण्यांची नकारात्मक चर्चा खूप झाली. परंतु 'अंजनीच्या सुता...'सारखं अतिशय उत्कृष्ट गीत दादांनी लिहिलं आहे, हे विसरता कामा नये.

त्यानंतर दीर्घकाळ लेखक मंडळींचं दर्शन रूपेरी पडद्यावर झालं नाही. अगदी अलीकडे लेखकांना पडद्यावर झळकवण्याचा मान मिळविला तो सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांनी. त्यांच्या नितळ या चित्रपटात त्यांनी थेट विजय तेंडुलकरांना एक छोटी भूमिका दिली होती. तेंडुलकरांनीही नायिकेच्या आजोबांची ही छोटेखानी भूमिका फार सुंदर केली होती. त्याआधी वास्तुपुरुष या चित्रपटात सुमित्राताईंनी महेश एलकुंचवार यांना रूपेरी पडद्यावर पेश केलं होतं. यातील भास्कर या पात्राची मोठेपणीची भूमिका एलकुंचवार यांनी साकारली होती. या चित्रपटाचं कथानक आणि एलकुंचवार यांची वाडा नाट्यत्रयी यांचा जैव संबंध असल्यानं या चित्रपटात एलकुंचवारांचं असणं फारच सूचक व महत्त्वाचं होतं. अवलिया लेखक अनिल अवचट हेदेखील असंच बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या विविध कलागुणांचा वापर त्यांच्या जवळच्या स्नेही असलेल्या सुमित्राताईंनी वास्तुपुरुष चित्रपटात करून घेतला होता. यात चित्रपटाच्या सुरुवातीला येणारं एक स्तोत्र अनिल अवचट यांच्याकडून त्यांनी गाऊन घेतलं. चित्रपटात येणारी बासरी अनिल अवचट यांनीच वाजविली आहे. नंतर एक कप च्या या चित्रपटात सुमित्राताईंनी थेट कमल देसाईंना छोटी भूमिका दिली होती. त्यांना या चित्रपटात आजीच्या भूमिकेत बघणं हा त्यांच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का होता. सुमित्रा भावे स्वतः समाजशास्त्रज्ञ व लेखिका होत्याच. मात्र, त्यांनी स्वतः भूमिका कुठे केली नाही. अगदी अलीकडं चैतन्य ताम्हाणे यानं त्याच्या 'डिसायपल' या चित्रपटात सुमित्रा भावे यांच्या आवाजाचा निवेदनासाठी चपखल वापर करून घेतला होता. दुर्दैवानं तो सुमित्रा भावे यांचा शेवटचाच चित्रपट ठरला.

लेखक आणि अभिनेता या दोन्ही भूमिकांत रमणारं आणखी एक प्रसिद्ध नाव म्हणजे दिलीप प्रभावळकर. चित्रपटांत ब्रेक मिळण्यापूर्वीपासूनच प्रभावळकर लेखन करीत होते. क्रिकेट हा त्यांच्या आवडीचा विषय. शिवाय मुलांसाठीही त्यांनी विपुल साहित्य लिहिलं आहे. चिमणराव व गुंड्याभाऊ या मालिकेपासून त्यांची अभिनयाची मोठी व प्रदीर्घ कारकीर्द सुरू झाली. मात्र, त्यांचं लेखनही सोबतच सुरू राहिलं. अनुदिनी या वृत्तपत्रीय स्तंभावरून तयार झालेली श्रीयुत गंगाधर टिपरे ही टीव्ही मालिका म्हणजे प्रभावळकरांच्या दोन्ही क्षेत्रांतील हुकुमतीचं दर्जेदार उदाहरण आहे. लेखक व अभिनेते म्हणून दोन्ही क्षेत्रांत त्यांना भरपूर पुरस्कार मिळाले आहेत. 'बोक्या सातबंडे' हा त्यांचा मानसपुत्र आणि त्याच्या करामती यांचा उल्लेख केल्याशिवाय मराठी बालसाहित्याचा इतिहास सांगणं अशक्य आहे.
प्रभावळकरांसारखंच दोन्ही क्षेत्रांत दमदार कामगिरी करणारं अलीकडच्या काळातलं प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणजे कवी व अभिनेता सौमित्र ऊर्फ किशोर कदम. किशोर हा जेवढा प्रतिभाशाली कवी आहे, तेवढाच तो दमदार अभिनेता आहे. गारवा हा अल्बम गाजल्यानंतर सौमित्रचं नाव सर्व महाराष्ट्राला माहिती झालं. त्यानंतर जोगवा ते अलीकडच्या 'दिठी'पर्यंत अभिनयातही त्याचं नाव दुमदुमतं आहे. किशोरप्रमाणंच असंच एक जोरदार नाव म्हणजे नागराज मंजुळे. नागराज मूळचा कवी. त्याच्या कविता अतिशय संवेदनशील आहेत. चित्रपटात तो नंतर आला. आपल्या चित्रपटात तो पाहुणा कलाकार म्हणून दिसतो. मात्र, दिग्दर्शक म्हणून त्याची कामगिरी अतिशय वरच्या दर्जाची आहे.
याशिवाय अतुल कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, (थोरली) सोनाली कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, हृषीकेश जोशी, किरण यज्ञोपवित ही सर्व मंडळी उत्तम लेखक आहेत. यांच्यावर केवळ अभिनेता किंवा नाटककार म्हणून शिक्का मारणं त्यांच्यावर अन्याय करणारं ठरेल. यातल्या मृणाल कुलकर्णीच्या तर घरातच साहित्याचा वारसा आहे. प्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकर हे तिचे आजोबा. आई वीणा देव मराठीतल्या प्रसिद्ध लेखिका. तो वारसा मृणालकडे आपोआपच आला आहे. हृषीकेशदेखील विपुल लिहीत असतो. उत्तम विनोदी नटाप्रमाणेच उत्तम विनोदी लेखक होण्याची मोठी क्षमता त्याच्यात आहे. सोनाली कुलकर्णीही विविध वृत्तपत्रांतून स्तंभांद्वारे लेखन करत असते. हे लोक आधीपासूनच उत्तम लिहिणारे होते आणि नंतर त्यांनी अभिनयाची वाट चोखाळली, असंही म्हणता येईल. अभिराम भडकमकर लेखक, कादंबरीकार, नाटककार म्हणून प्रसिद्ध आहेत. महेश कोठारे यांच्या 'पछाडलेला' या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका केली होती.
हिंदी चित्रपटसृष्टीचा विचार करता, मीनाकुमारीपासून ते दीप्ती नवलपर्यंत अनेक अभिनेत्रींची उदाहरणे सांगता येतील. मीनाकुमारी उत्तम शायरा होत्याच. त्यांच्या लिखाणात एक खोल 'दर्द' आहे. मीनाकुमारी यांना चित्रपटाच्या पडद्यावरही 'ट्रॅजेडी क्वीन' म्हणूनच ओळखलं गेलं. त्या चित्रपटसृष्टीत फार काळ रमल्या नसत्या, तर एक उत्तम लेखिका, शायरा, गझलकार म्हणूनही प्रसिद्ध झाल्याच असत्या, यात वाद नाही. दीप्ती नवलही उत्तम लेखिका, कवयित्री आहे. तिच्या सर्व भूमिकांप्रमाणेच तिची ही लेखिका म्हणून भूमिकाही तिच्या चाहत्यांना आवडते. अगदी अलीकडच्या काळातलं, जरा उलटं उदाहरण द्यायचं तर ट्विंकल खन्नाचं देता येईल. अभिनेत्री म्हणून अपयशी कारकिर्दीनंतर ट्विंकलनं लेखनाकडं लक्ष वळवलं. आज ती इंग्लिशमधील उत्तम विनोदी लेखन करणारी यशस्वी लेखिका म्हणून गणली जाते. तिचं पुस्तकही प्रसिद्ध झालं आहे.
प्रसिद्ध लेखक-गीतकार, दिग्दर्शक गुलजार यांना घेऊन बासू भट्टाचार्य यांनी सत्तरच्या दशकात 'असमाप्त कविता' नावाचा चित्रपट करायला घेतला होता. यात गुलजार यांची नायिका शर्मिला टागोर असणार होती. गुलजार यांना यात एका प्रकाशकाची भूमिका करायची होती. मात्र, काही रिळं शूटिंग झाल्यावर हा चित्रपट डब्यात गेला आणि नायक म्हणून पदार्पण करण्याचं गुलजार यांचं स्वप्न अधुरंच राहिलं. शीर्षकाप्रमाणेच हा सिनेमाही 'असमाप्त'च ठरला. मात्र, बासू भट्टाचार्य यांनी नंतर १९७७ मध्ये 'गृहप्रवेश' या चित्रपटाच्या वेळी गुलजार यांना पडद्यावर झळकावलंच. याखेरीज एन. चंद्रा यांच्या 'वजूद' नावाच्या चित्रपटातही गुलजार यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती.
अलीकडच्या काळातील ठळक नाव म्हणजे पीयूष मिश्रा. पीयूष मिश्रा हे नाटकातलं बहुरंगी-बहुढंगी व्यक्तिमत्त्व. गीतकार म्हणून नाव कमावल्यानंतर पीयूष मिश्रांनी अनेक चित्रपटांतून लहान-मोठ्या भूमिका केल्या. त्यांचा चेहरा आता सिनेरसिकांना चांगलाच परिचित आहे. गुलाल, तेरे बिन लादेन, गँग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका लक्षात राहिल्या आहेत. असेच आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे इंदूरचे मूळ मराठी स्वानंद किरकिरे. प्रसिद्ध गीतकार असलेल्या स्वानंद किरकिरेंनी पडद्यावरही अनेक भूमिका केल्या आहेत. अगदी अलीकडे आलेल्या चुंबक नावाच्या मराठी चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका होती. याशिवाय 'भाई : व्यक्ती आणि वल्ली' या चित्रपटात त्यांनी कुमार गंधर्वांची छोटीशी भूमिका केली होती.
याखेरीज अनेक लेखक, साहित्यिकांना कधी गमतीत, तर कधी गांभीर्याने कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याचं धैर्य दाखवलं आहे. त्यातले काही चित्रपट डब्यात गेले असतील, तर काही विस्मरणात गेले असतील. या लेखातही सर्वांचा आढावा घेणं अशक्य आहे. काही नावं विस्मृतीत गेलेली असू शकतात, तर काही नोंदी नोंदवायच्या राहून गेलेल्या असतील. मात्र, यापैकी काही प्रतिभाशाली मंडळींचं स्मरण यानिमित्तानं करता आलं, यामुळं माझ्यासाठी तरी ही आनंदाची स्मरणयात्रा ठरली आहे, यात वाद नाही.

----


(पूर्वप्रसिद्धी : अक्षरदान दिवाळी अंक २०२१)


---


28 Nov 2021

समतोल दिवाळी अंक २०२१ - लेख

 स्पर्श ‘रूपेरी’
----------------


स्पर्श... एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीला होणारा स्पर्श! किती काय काय दडलेलं असतं या स्पर्शात! एक तर जिवंतपणाची भावना... शिवाय प्रेम, अधिकार, वासना, माया, ममता, लोभ, तिरस्कार... किती तरी भावना एका स्पर्शात गुंतलेल्या असू शकतात... माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याला माणसांच्या सहवासात राहायला आवडतं. कळप करून राहणारे प्राणी असतात, त्याच समूहापैकी मानव हा एक प्राणी आहे. माणसाचा मेंदू अर्थातच इतर कुणाहीपेक्षा अधिक प्रगत असल्याने त्याच्या भावभावना आणि त्यांचं प्रदर्शन यांच्याही परी अनेक! माणसाच्या पाच ज्ञानेंद्रियांपैकी त्वचा हे अर्थातच स्पर्शाचं पहिलं आणि सर्वांत प्रभावी इंद्रिय! स्पर्शाची जाण प्रथम होते ती त्वचेला... त्यानंतरचे स्पर्शाचे लाभार्थी इंद्रिय म्हणजे डोळे! त्यानंतर जीभ, मग कान व नाक! कुणी स्पर्श केलाय हे डोळ्यांना दिसतं आणि मग आपला मेंदू तसा प्रतिसाद देतो. स्पर्शाची जाणीव अतिशय तीव्र असते. स्पर्शाप्रती आपलं शरीर विलक्षण संवेदनशील असतं आणि इथेच स्पर्श आणि त्यासंबंधीचे सर्व आचार-विचार यांचे नियम येतात. माणसानं समाज म्हणून जसजशी प्रगती केली तसतसे जगण्याचे, आहाराविहाराचे नियम तयार केले. अनावश्यक स्पर्श टाळण्याकडे या नियमांचा कल असणं स्वाभाविक होतं. तसं झालं नसतं, तर वासनेचा स्पर्श कायमच इतर स्पर्शांवर वरचढ ठरण्याची भीती तत्कालीन समाजाला वाटत होती. (खरं तर माणसाची नैसर्गिक आदिम प्रेरणा जोवर जिवंत आहे, तोवर ही भीती राहणारच!) मात्र, याचा तोटा असा झाला, की अनावश्यक स्पर्श टाळण्याच्या नादात आवश्यक स्पर्शही दूर सारले गेले. स्पर्शात असलेली निखळ मायेची, ममतेची भावना हरपली आणि माणसं चांगल्या स्पर्शालाही पारखी झाली.
चित्रपट ही तशी आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित कला. एकोणिसावे शतक संपताना पॅरिसमध्ये ल्युमिए बंधूंनी पहिल्या चलतचित्रांचं सादरीकरण केलं आणि सिनेमा आपल्या आयुष्यात आला. विसाव्या शतकात या कलेचा पूर्ण विकास झाला आणि आता तर आपल्या जगण्यातून सिनेमा आपण वजा करूच शकत नाही.
भारतात चित्रपटसृष्टीची सुरुवात दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या मूकपटाद्वारे १९१३ मध्ये झाली. तेव्हा चित्रपटात स्त्री-पुरुष स्पर्शाची दृश्यं दाखवणं जवळपास अशक्य होतं, याचं कारण मुळात चित्रपटांत महिलांनी काम करणं हेच निषिद्ध मानलं जात होतं. दादासाहेब अगदी वेश्यांकडेही गेले. मात्र, ‘आम्ही वेश्या आहोत, सिनेमात काम करण्यासारखं हलकं काम आम्ही करणार नाही,’ असे बाणेदार उत्तर तेव्हाच्या वेश्यांनी त्यांना दिलं होतं. त्यानंतर साळुंके नावाच्या एका पुरुष कलाकारालाच मिशी उतरवून ‘तारामती’ची भूमिका देण्यात आली होती, हा इतिहास आता बहुतेकांना माहिती आहे. सुरुवातीचे मूकपटही बहुतेक पौराणिक कथांवर आधारित होते आणि ते अगदीच समजण्यासारखं होतं. त्यानंतर मात्र स्टंटपटांचा एक काळ आला. वाडिया मूव्हिटोनने ‘फिअरलेस नादिया’ला घेऊन अनेक स्टंटपट त्या काळात आणले. मेरी ॲन इव्हान्स असं नाव असलेल्या, मूळ ऑस्ट्रेलियन असलेल्या या नटीचा ‘हंटरवाली’ हा चित्रपट १९३५ मध्ये प्रदर्शित झाला आणि तुफान हिट झाला. ही विभागणी अगदी सरळ होती. कुणी कुठलं काम करायचं आणि कुणी नाही याचे संकेत ठरले होते. अर्थात लवकरच म्हणजे १९३१ मध्ये ‘आलमआरा’ हा पहिला बोलपट आला आणि त्यानंतर सिनेमा बोलू लागल्यानंतरचं चित्र झपाट्यानं बदललं. पहिलं चुंबन दृश्यही याच काळात चित्रित झालं. ते होतं हिमांशू रॉय आणि देविकाराणी यांच्यात! सिनेमाचं नाव होतं ‘कर्मा’. तेव्हाच्या पद्धतीनुसार थेट प्रणयी चुंबन न दाखविता, नायक साप चावून बेशुद्ध पडला आहे आणि नायिका त्याला शुद्धीवर आणण्यासाठी तोंडाने श्वास देते आहे, अशा पद्धतीनं हे दृश्य चित्रित करण्यात आलं होतं. तरीही होतं ते चुंबनच आणि ते दृश्य तब्बल चार मिनिटांचं होतं. देविकाराणी यांना भारतीय चित्रपटांची ‘फर्स्ट लेडी’ म्हटलं जायचं आणि हिमांशू रॉय हे त्यांचे खऱ्या आयुष्यातले पतीच होते, हा तपशीलही तसा महत्त्वाचाच!
मा. विनायक यांनी ‘ब्रह्मचारी’ या १९३८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात मीनाक्षी शिरोडकर या अभिनेत्रीला बिकिनीत पेश करून मराठी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडवून दिली होती. ‘यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया का लाजता?’ हे त्यांचं गाणं तेव्हा सुपरहिट ठरलं. यात नायक-नायिका एकमेकांना थेट स्पर्श करीत नसले, तरी मुळात नायिकेला बिकिनीत दाखविणे हीच मराठी चित्रपटांसाठी एक क्रांती होती. (त्यानंतर मराठी चित्रपटात नायिका बिकिनीवर दिसण्यासाठी थेट २०१२ हे वर्ष उजाडावं लागलं. ‘नो एंट्री’ या सिनेमाच्या मराठी रिमेकमध्ये सई ताम्हणकर बिकिनीत झळकली होती. यावरून मा. विनायक यांनी १९३८ मध्ये केलेल्या धाडसाची पातळी लक्षात यावी.) स्वातंत्र्यपूर्व काळात स्टुडिओ पद्धत कायम होती, तरी वेगवेगळे विषय पडद्यावर येऊ लागले होते. अशोककुमारचा ‘किस्मत’ (१९४२) हा या प्रकारच्या चित्रपटांमधला ‘माइलस्टोन’ म्हणावा लागेल. यात पहिल्यांदाच नायक हा न-नायक (अँटिहिरो) दाखविण्यात आला होता. हिंदी चित्रपटसृष्टी बदलत चालली होती. मोकळ्या स्पर्शांना आत्मसात करत होती, याचंच हे द्योतक होतं.

त्यानंतर थोड्याच अवधीत भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि आपल्या चित्रपटसृष्टीतही बदलांचं मोकळं वारं वाहू लागलं. राज कपूरने हिंदी चित्रपटसृष्टीतील नायक-नायिकांच्या प्रेमाला एक आक्रमक परिमाण दिलं. नायकाच्या एका हातात व्हायोलिन आणि एका हातावर रेललेली नायिका हे ‘बरसात’मधलं दृश्य पुढं ‘आरके स्टुडिओ’चा बॅनर बनलं. ‘आवारा’तल्या ‘दमभर जो उधर मूँह फेरे ओ चंदा...’सारख्या गाण्यात दिसणारा थेट आव्हान देणारा प्रणय प्रेक्षकांनी तत्पूर्वी फार क्वचित मोठ्या पडद्यावर पाहिला होता. तत्कालीन भारतीय समाजमानस पाहिलं, तर नायक-नायिकेच्या अशा जवळिकीची, स्पर्शाची दृश्यं चित्रपटांतूनच पाहायला मिळण्यासारखी स्थिती होती. देशातील बहुसंख्य जनता गरिबीत जगत होती आणि अनेकांना दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत होती. तेव्हाही महानगरांमधून छोट्याशा घरांतून लोक राहत असत आणि प्रणयासाठी वेगळी जागा मिळणं किंवा तेवढा निवांतपणा मिळणं हे दुरापास्तच होतं. ग्रामीण भागातील अडचणी आणखीन निराळ्या होत्या. स्त्रियांनी ‘चूल आणि मूल’ एवढ्यापुरतंच मर्यादित राहावं, अशीच एकूण समाजधारणा होती. अशा वेळी तेव्हाच्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या फँटसीला स्पर्श केला. चित्रपट म्हणजे रूपेरी पडद्यावरची विलक्षण सुंदर, स्वप्नील दुनिया ठरली. प्रत्यक्ष आयुष्यात जे जे करणं शक्य नाही, ते ते चित्रपटाच्या नायक-नायिकेच्या रूपाने अनुभवण्याचं सुख प्रेक्षकांना लाभलं. प्रणयातील स्पर्शाबाबत समाज पूर्वीपासूनच फार कठोर होता. अगदी आजही हे चित्र बदललेलं नाही. समाजातील दांभिकता अशा वेळी अगदी लख्ख उठून दिसते. ते काहीही असलं, तरी चित्रपटांनी बदलत्या काळानुसार, धाडसीपणा दाखवीत स्पर्श या संकल्पनेबाबत असलेली एक अदृश्य नकारात्मकता तोडून टाकली. चित्रपटांचा प्रवास समाजाच्या धारणांशी समांतर होत असला, तरी फँटसीबाबत (मग ती कुठलीही असो!) हा रथ थोडा दशांगुळे वर चालतो. प्रेक्षकांनाही तेच हवं असतं. 

स्पर्शाबाबत अगदी वेगळा विचार करणारे काही चांगले चित्रपट आले. सई परांजपे यांचा ‘स्पर्श’ हा हिंदी चित्रपट तर त्याच्या नावापासूनच या विषयाशी जोडला गेला आहे. अंध मुलांच्या शाळेचा प्रिन्सिपॉल असलेला अंध नायक, त्याची अंध शाळा, तिथल्या मुलांचं भावविश्व आणि या जगात ‘डोळस’ नायिकेचं आगमन होणं... हा सर्व प्रवास सई यांनी फार तरलतेनं दाखवला आहे. अंध व्यक्तीला स्पर्शाचं किती महत्त्व असतं, हे सांगायला नको. हा चित्रपट त्या स्पर्शाची महती सांगत असतानाच ‘डोळस’ व्यक्तींनाही आणखी डोळस बनवतो, यात शंका नाही. उत्कृष्ट संवाद, नसीरुद्दीन शाह व शबाना आझमी यांचा अप्रतिम अभिनय आणि सई यांचं संवेदनशील दिग्दर्शन यामुळं आजही हा चित्रपट अनेक रसिकांच्या मन:पटलावर कोरला गेला आहे. यातली अनेक दृश्यं डोळ्यांत पाणी आणतात. एखाद्या व्यक्तीकडं एखादं ज्ञानेंद्रिय नसेल, तर त्याची अन्य ज्ञानेंद्रियं अत्यंत तीक्ष्ण आणि तीव्र होतात. या चित्रपटात अंध व्यक्तींच्या आयुष्यातले असे अनेक क्षण कमालीच्या तरलतेनं दाखविले आहेत. नसीरुद्दीन आणि शबाना यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर ते सर्व प्रसंग अगदी जिवंत, रसरशीत केले आहेत.
‘कोशिश’सारख्या चित्रपटात जया भादुरी आणि संजीवकुमार यांनी मूकबधिर दाम्पत्याची भूमिका कमालीच्या प्रभावीपणे रंगविली होती. त्यातही स्पर्शाची महती कित्येक प्रसंगांत दिसून येते. ‘खामोशी - द म्युझिकल’ आणि ‘ब्लॅक’ यासारख्या चित्रपटांतून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी अनुक्रमे मूक-बधीर माता-पित्यांची मुलगी आणि अंध व मूक मुलगी व तिचे शिक्षक यांची कथा प्रत्ययकारकरीत्या सांगितली होती. या चित्रपटांत स्पर्शाचं महत्त्व अगदी अनन्यसाधारणपणे आपल्यासमोर येतं. ही काही सहज आठवणारी आपल्याकडची ठळक उदाहरणं. चित्रपटांमधला स्पर्श या कलाकृतींमधून अगदी प्रगल्भ आणि संवेदनशीलतेनं मांडल्याचं सहज दिसून येतं.
हिंदी चित्रपटसृष्टीत स्पर्शाच्या बाबतीत मोकळेपणा आला, त्याला आणखी एक महत्त्वाचं कारण असावं असं मला वाटतं. हिंदी चित्रपटसृष्टीवर पहिल्यापासून पंजाबी मंडळींचं प्राबल्य राहिलेलं आहे. पंजाबी मंडळी स्वभावानं मोकळीढाकळी असतात. दोन द्यावेत, दोन घ्यावेत असा एकूण त्या मातीचाच गुण दिसतो. शरीरानं काबाडकष्ट करावेत, मजबूत खावं-प्यावं आणि जगणं साजरं करत राहावं अशी एकूण वृत्ती दिसते. त्यामुळं तिथं स्पर्शाबाबत कुठलेही अवडंबर नाही. एखादी तरुण नात आपल्या आजोबांना येऊन बिलगू शकते, तर एखादा रसिक जिजाजी सहज आपल्या ‘साली’ला गमतीत मिठी मारू शकतो. पंजाबी किंवा एकूणच उत्तर भारतीय संस्कृतीत असलेला हा मोकळेपणा हिंदी चित्रपटसृष्टीतील स्पर्शाबाबत फार मोलाचा ठरला. त्यामुळे हिंदी सिनेमांत एखादा नायक (भले तिशीचा दिसत असला, तरी) ‘माँ, मैं बीए पास हो गया हूँ’ म्हणत धावत येऊन आपल्या ‘माँ’ला सहज बिलगू शकायचा. तुलनेनं मराठी संस्कृतीत, आणि पर्यायाने मराठी सिनेमात हे बसत नाही. कल्पना करा, रमेश देव किंवा रवींद्र महाजनी किंवा अरुण सरनाईक किंवा कुलदीप पवार पळत येऊन, दुर्गा खोटे किंवा सुमती गुप्ते किंवा शांता जोग यांना येऊन ‘आई, आई... मी बीए पास झालो’ म्हणत मिठी मारताहेत... शक्यच नाही हे आपल्याकडे!
मा. विनायक यांनी १९३८ मध्ये नायिकेला बिकिनी परिधान करायला लावली असली, तरी मराठीत नायक-नायिकांनी शारीर जवळीक साधण्याचं प्रमाण पुढच्या काळात जवळपास शून्यवत होतं. फार तर एखादी अवघडलेली मिठी... चुंबन वगैरे गोष्ट तर लांबच राहिली. ते दाखवण्यासाठी दोन गुलाबाची किंवा चक्क झेंडूची फुलं एकमेकांवर आपटायची. किंवा नायक-नायिका एकमेकांच्या तोंडाजवळ येत येत एकदम कॅमेऱ्याच्या फ्रेममधून वर, खाली, डावीकडे, उजवीकडे असे कुठेही ‘फेड आउट’ व्हायचे. जी काही फेडाफेडी असेल, ती प्रेक्षकांच्या डोळ्यांआड! साधारण ऐंशीच्या दशकापर्यंत हे असंच होतं. मराठी नायकांची (आणि त्यांचीच का? नायिकांचीही) या काळात पडद्यावर झालेली कुचंबणा अगदीच कारुण्याची झालर वगैरे लेवून आलेली होती. वास्तविक, सूर्यकांत, चंद्रकांत, रमेश देव, श्रीकांत मोघे, अरुण सरनाईक किंवा रवींद्र महाजनी हे सर्वच नायक रूपाने देखणे होते. उंचेपुरे होते. मात्र, त्यांना पडद्यावर फार शारीर जवळीक साधून, नायिकेशी प्रणय करताना दाखवणं कुठल्याही मराठी दिग्दर्शकाला तेव्हा तरी जमलं नाही. मराठी चित्रपटांत व्यवस्थित चुंबनदृश्य यायला एकविसावं शतक उजाडावं लागलं. माझ्या आठवणीनुसार, २०१० मध्ये आलेल्या ‘जोगवा’ या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि उपेंद्र लिमये यांचं चुंबनदृश्य होतं. त्यानंतर ‘डबलसीट’ या चित्रपटातही अंकुश चौधरीसोबत मुक्ता बर्वेचं एक चुंबनदृश्य आलं. हल्लीच्या काळात चुंबनदृश्यांना प्रेक्षक सरावले असले, तरी मराठी चित्रपटांत अशी दृश्यं पाहायला प्रेक्षक आजही जरा दचकतात हेच खरं. किंबहुना पूर्वी मराठी चित्रपटांना ‘ए’ (फक्त प्रौढांसाठी) हे प्रमाणपत्र फार क्वचित असायचं. ‘पुणे ५२’ या चित्रपटाला तसं सर्टिफिकेट होतं आणि त्याला साजेशी बोल्ड दृश्यंही त्या चित्रपटात होती. त्यानंतर तसे इतरही काही मराठी चित्रपट झळकले.
हिंदी काय, इंग्रजी काय किंवा मराठी काय; कुठल्याही चित्रपटांत शारीर जवळिकीची, निकट स्पर्शाची दृश्यं साकारणं हे संबंधित अभिनेत्यांसाठी तसं कठीणच काम असणार! तीव्र प्रखर उजेड देणारे लाइट्स, कॅमेरे, साउंड आणि इतर अनेक तंत्रज्ञ मंडळींच्या उपस्थितीत चुंबनदृश्य किंवा प्रणयदृश्य देणं, ते भाव नजरेत आणणं हे सराईत अभिनेत्यांनाच जमू शकतं. शिवाय तो ‘अभिनय’च असतो. सामान्य प्रेक्षकांना त्या क्षणापुरता त्या नायकाचा कितीही ‘हेवा’ वाटला, तरी प्रत्यक्ष नायकाला तो प्रसंग साकारणं तितकंच सुखद किंवा सहज असतंच असं नाही. नायिकांची अवस्थाही काही यापेक्षा वेगळी नसणार!
अलीकडे ओटीटी माध्यम आल्यापासून तर सेन्सॉर नसल्याने या स्पर्शाला काही धरबंधच राहिलेला नाही. ‘जे खपतं, तेच विकायचं’ या तत्त्वानुसार, लैंगिक भावना चेतविल्या जातील, अशा भडक दृश्यांची रेलचेल बहुतेक वेबसीरीजमध्ये असते. त्यातील काही दृश्ये मुद्दाम आधी सोशल मीडियावर लीक केली जातात. प्रेक्षकांची प्रतिक्रिया आजमावली जाते आणि मग ती सीरीज ‘गाजविली’ जाते. अर्थात ओटीटीवरचे स्पर्श हा स्वतंत्र लेखाचाच विषय होईल. या लेखापुरता केवळ चित्रपटांचा विचार केला तरी पूर्वीपेक्षा या रूपेरी स्पर्शांत खूप जास्त सहजता, मोकळेपणा आला आहे हे मान्य करायला पाहिजे. विशेषत: एकविसाव्या शतकात जन्मलेल्या पिढीसाठी ‘स्पर्श’ ही कुठलीही कलंकित किंवा अवांछित चीज नसून, ती एक अगदी सहज घडणारी शारीर क्रिया आहे. मनाचा हा नितळपणा दुर्दैवानं आधीच्या पिढ्यांमध्ये नव्हता. त्यासाठी तेच जबाबदार होते, असंही नाही. तेव्हाचे संस्कारच तशा पद्धतीनं घडण करणारे होते. आताच्या पिढीमध्ये ते अवघडलेपण नाही, तसंच स्पर्शाविषयीची अनावश्यक, फाजील, छुपी अशी कुठलीही धारणाही नाही. तेच प्रतिबिंब आजच्या चित्रपटांत उमटतंय, यात आश्चर्य नाही. स्पर्श या निखळ आनंददायक भावनेचा आविष्कार तसाच होत असल्याचं पाहून चित्रपटांचा पडदाही अधिक ‘रूपेरी’ व देखणा दिसू लागला आहे.
टच वूड!

---

(पूर्वप्रसिद्धी : समतोल दिवाळी अंक २०२१)

---

29 Oct 2021

साहित्य शिवार दिवाळी अंक २०२१ - लेख

लक्षात राहिलेली असाइनमेंट
----------------------------------


पत्रकारितेच्या पेशात सर्वांत आनंददायक भाग विविधांगी अनुभवांचा असतो. एरवी सहजासहजी जे अनुभव घेता येत नाहीत ते या पेशात सहज घेता येतात. वेगवेगळ्या व्यक्तींना भेटता येतं, अनेक ठिकाणांना भेटी देता येतात आणि अनेक घटनाचं वार्तांकन प्रत्यक्ष उपस्थित राहून करता येतं. अनेक जण केवळ या अनुभवांसाठी पत्रकारितेत येतात. अर्थात पत्रकारितेत सर्वांनाच हे ‘थ्रिल’ अनुभवता येतं असं नाही. विशेषत: डेस्कला, म्हणजे उपसंपादक म्हणून जी मंडळी काम करत असतात, त्यांना वार्ताहरांसारखी बाहेर जाऊन असे वार्तांकन करण्याची संधी तुलनेनं कमी वेळा मिळते. माझ्या सुदैवानं मी उपसंपादक असूनही मला काही अविस्मरणीय असाइनमेंट मिळाल्या. माझ्या परीने मी त्या चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याचा प्रयत्न केला.
मी ‘सकाळ’मध्ये काम करीत असताना केलेल्या एका दौऱ्याची हकीकत इथं सांगणार आहे. आपल्या संसदेवर १३ डिसेंबर २००१ रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होताना, म्हणजे डिसेंबर २००२ मध्ये या हल्ल्यात मरण पावलेल्या जवानांच्या नातेवाइकांशी बोलून एक रिपोर्ताज करावा, असं मला तेव्हाचे आमचे संपादक अनंत दीक्षित यांनी सांगितलं. ही मोठीच जबाबदारी होती. मी अगदी थरारून गेलो. मी लगेच या घटनेची सर्व माहिती जमा करण्यास सुरुवात केली आणि जोडीला दिल्लीला जाण्याची तयारीसुद्धा! साधारण आठ ते दहा दिवसांचा दौरा होता.
या दौऱ्याची हकीकत सांगण्यापूर्वी १३ डिसेंबर २००१ याच दिवसाची एक आठवण सांगणं अप्रस्तुत ठरणार नाही. नगरचे नुकतेच दिवंगत झालेले माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासंदर्भातील ही आठवण आहे. मी १९९९-२००० या वर्षात बी. सी. जे. (बॅचलर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम) हा कोर्स पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पूर्ण केला. या वर्षाच्या शेवटी दिल्लीला ट्रिप जायची. आम्ही मार्च २००० मध्ये दिल्लीच्या ट्रिपला गेलो. या ट्रिपच्या निमित्ताने मी दिल्ली प्रथमच पाहिली. संसद भवन पाहायला मिळालं. संसदेचं अधिवेशन सुरू होतं. तिथल्या कडक सुरक्षाव्यवस्थेतून आत प्रेक्षक गॅलरीत जाऊन कामकाज पाहिलं. नंतर तिथल्या प्रसिद्ध व्हरांड्यातून आम्ही फिरत होतो. राम नाईकांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथं दिलीप गांधी बसले होते. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. ‘मी पण नगरचाच’ वगैरे सांगून जरा जवळीक दाखवली. त्यांनी त्यांचं कार्ड दिलं. ते घेतलं आणि आम्ही तिथून परतलो. त्यानंतर पुढच्याच वर्षी १३ डिसेंबर २००१ रोजी संसद भवनावर दहशतवाद्यांचा हल्ला झाला. आम्ही ‘सकाळ’ ऑफिसमध्ये तेव्हा टीव्हीवर बातम्या बघत होतो. त्या वेळी एका चॅनेलवर खासदार दिलीप गांधी दहशतवाद्यांच्या गोळीबारातून बचावले, असं सांगत होते. मला एकदम आठवलं, की माझ्याकडं त्यांचं कार्ड आहे. मी ऑफिसमध्ये सांगून, त्यांच्याशी बोलता येतंय का बघू असं ठरवलं. माझ्या कार्डवर त्यांचा मोबाइल आणि दिल्लीतल्या घरचा असे दोन्ही नंबर होते. मोबाइल लावला तर तो लागला नाही. मग थोड्या वेळाने घरचा लँडलाइन नंबर लावला. गांधी घरीच होते. मी त्यांना माझा परिचय सांगितला आणि त्या घटनेविषयी विचारलं. त्यांनी सांगितलं, की हल्ला झाला, तेव्हा ते त्या व्हरांड्यातच होते. संसद भवनाच्या त्या प्रसिद्ध मोठमोठ्या गोल खांबांजवळून ते जात असताना अचानक गोळी आली आणि त्यांच्या जवळून गेली. त्या वेळी ते त्या खांबांमागे गेले आणि त्यामुळे वाचले इ. इ.
मी सर्व तपशील देऊन ती बातमी लिहिली आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ डिसेंबर २००१ रोजी ‘सकाळ’च्या पहिल्या पानावर माझ्या बायलाइनने (‘श्रीपाद ब्रह्मे यांजकडून’ अशी बायलाइन देण्याची तेव्हा स्टाइल होती...) प्रसिद्ध झाली. ‘गोळी सुटली आणि मी खांबामागे लपलो...’ असं काही तरी शीर्षक होतं. ती बातमी मी बरेच दिवस जपून ठेवली होती. थोडक्यात, ही हल्ल्याची घटना घडली त्या दिवशीही वार्तांकनात मी थोडाफार असा सहभाग नोंदवला होताच. कदाचित त्यामुळेच दीक्षितसाहेबांनी मला या मुलाखती घेण्यासाठी पाठवण्याचं ठरवलं असावं. काही का असेना, मला ही असाइनमेंट मिळाली हे खरं!
तेव्हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बरंच काय काय घडत होतं. जगात उलथापालथ सुरू होती. एकविसावं शतकाचं आगमन सर्व जगानं मोठ्या उत्साहानं केलं होतं. मात्र, दहशतवादाचं एक अदृश्य सावट तोवर सगळीकडं पसरलेलं स्पष्ट जाणवत होतं. भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन वर्षांपूर्वीच कारगिलचं युद्ध झालं होतं. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लाहोर बसयात्रा काढून पाकिस्तानशी मैत्रीचा हात पुढं केला होता. मात्र, पाकिस्ताननं ‘कारगिल’ घडवून आपला विश्वासघात केला होता. कारगिलमध्ये पाकिस्तानला आपण चोख धडा शिकवला असला, तरी पुढच्या काळात पाकिस्तानबरोबरच्या संबंधांत कमालीची कटुता आली होती. जगभरात दहशतवादाचं सावट गडद होत होतं. त्यात ११ सप्टेंबर २००१ रोजी कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेननं न्यूयॉर्कमधील ट्विन टॉवर्सवर विमानं धडकवून इतिहासातला सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणला. या भयानक हल्ल्यानं सर्व जग भयचकित झालं होतं. या हल्ल्यानंतर केवळ तीनच महिन्यांत भारताच्या संसदेवर दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात आला होता. तिथे तैनात असलेल्या कडक सुरक्षाव्यवस्थेमुळं दहशतवादी आतपर्यंत जाऊ शकले नाहीत. देशातील सर्व प्रमुख राजकीय नेते तेव्हा संसदेच्या इमारतीत होते. दहशतवादी संसदेच्या मुख्य इमारतीत प्रवेश करू शकले असते, तर काय झालं असतं, याची कल्पनाही करवत नाही.
या हल्ल्याची वर्षपूर्ती जवळ आली, तेव्हा म्हणजे साधारणत: २००२ च्या नोव्हेंबर महिन्यात संपादक अनंत दीक्षित यांनी मला बोलावून, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलिस व जवानांच्या नातेवाइकांना भेटून लेख करण्याची कामगिरी सोपविली. मी दोन-अडीच वर्षांपूर्वी दिल्लीला गेलो होतोच. आता या दौऱ्यानिमित्त पुन्हा दिल्लीवारी होणार, याचा आनंद होता. तेव्हा मोबाइल खूप प्रमाणात सर्वांकडे नव्हते. माझ्याकडे तर मोबाइल नव्हताच. आमचं दिल्लीला ऑफिस होतं आणि विजय नाईक, अनंत बागाईतकर ही ज्येष्ठ मंडळी तिथं होती. त्यामुळं मी निर्धास्त होतो.
पुण्यातून २५ नोव्हेंबर २००२ रोजी पहाटेच्या वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेसनं मी दिल्लीला निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाला हजरत निजामुद्दीनला पोचलो. इंडियन न्यूजपेपर्स सोसायटीच्या (आयएनएस) गेस्ट हाउसमध्ये माझी राहण्याची सोय होती. याच इमारतीत आमचं ‘सकाळ’चं कार्यालय होतं. इतर वृत्तपत्रांचीही कार्यालयं त्या इमारतीत होती. रफी अहमद किडवाई मार्गावर तेव्हा दिल्ली मेट्रोचं काम सुरू होतं, हे आठवतंय. ‘आयएनएस’च्या समोरचा रस्ता पूर्ण खोदून ठेवला होता. संसद भवनाला भेट द्यायची होती. म्हणून मग विजय नाईकांना फोन केला. ‘संसदेसाठीच्या पासाचा अर्ज करून ठेवू, उद्या मिळेल,’ असं ते म्हणाले. आमचं तिथलं ऑफिस साधारण साडेदहाला उघडायचं. तेव्हा विवेक नाशिककर हे तिथं कार्यालयीन सहायक होते. मग मी माझे फोटो त्यांच्याकडं देऊन ठेवले. नाशिककरांनी अर्ध्या तासात संसदेतून माझा अर्ज आणला. मी तो भरून दिला.
माझ्याकडं या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांची यादी होती. नाईकसाहेबांनी या मंडळींचे पत्ते मिळवून दिले होतेच. मग मी माझी मोहीम सुरू केली. पहिले हुतात्मा होते मातबरसिंह नेगी. दिल्लीत मंदिर मार्ग परिसरात नेगींचं घर होतं. रिक्षानं गेलो. तिथं मातबरसिंह नेगींचं घर शोधलं. त्यांच्या पत्नी, मुलगा, जावई, मुलगी भेटले. नेगींच्या पत्नी टिपिकल पंजाबी घरातल्या. त्यांना पतीच्या आठवणीनं गहिवरून येत होतं. एवढ्या लांबून पुण्याहून हा एक मुलगा मुलाखत घ्यायला आलाय, असं काहीसं कौतुकही त्यांच्या डोळ्यांत होतं. ही पहिली मुलाखत उत्तम झाली. मला आता पुढच्या मुलाखतीचे वेध लागले होते. पुढचे पोलिस हुतात्मा होते बिजेंद्रसिंह गुर्जर. ते मोलडबंद नावाच्या गावात राहत होते. मग आकाशवाणीच्या स्टॉपवरून ४६० नंबरची बस पकडून बदरपूरला गेलो. तिथं मोलडबंद गावात गुर्जर यांचं घरही लगेच सापडलं. मुळात वर्षभरात या हुतात्मा पोलिसांची व त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रसिद्धी बऱ्यापैकी झाली होती. त्यामुळं कुणालाही विचारलं, तर लगेच लोक पत्ता सांगायचे. अर्थात पुढे वेगळे अनुभवही आले. बिजेंद्रसिंहांचं घर टिपिकल उत्तर भारतीय. वरच्या गच्चीत बाजा वगैरे टाकलेल्या होता. हुक्काही दिसला. हे सर्व पोलिस व त्यांचे कुटुंबीय तसे अगदी साधे होते. बिजेंद्रसिंहांची पत्नी, पाच मुलं व सासरे भेटले. त्यांचेही फोटो काढले. बिजेंद्रसिंहांचे सासरे सुभेदार होते. त्यांचं नाव लक्षात नाही आता, पण त्यांनी भरपूर गप्पा मारल्या. पहिल्याच दिवशी दोन मुलाखती चांगल्या झाल्यानं मला हुरूप आला. तेव्हा मी वहीत मुद्दे लिहून घेत होतो. मुलाखती झाल्यावर लगेच रात्री त्या सविस्तर लिहून काढल्या आणि मगच झोपलो.
बुधवार, २७ नोव्हेंबर २००२. आज राठधाना या गावी शहीद नानकचंद यांच्या घरी जायचं होतं. दिल्लीतल्या ‘महाराणा प्रताप अंतर्राज्यीय बस अड्ड्या’वर पोचलो. तिथं लगेच सोनीपतची बस मिळाली. एक वाजता सोनीपतला पोचलो. हरियाणा राज्यात मी प्रथमच येत होतो. धुळीनं माखलेल्या त्या गावातून लगेच ‘राठधाना’ला जायला बस नव्हती. मग सायकलरिक्षा करून सुभाष चौकात गेलो. तिथं तो सायकलरिक्षावाला म्हणाला, की आणखी दुसरीकडंनंच राठधानाला जाणारे ‘टप्पू’ मिळतील. (हे एक अजबगजब वाहन आहे. उत्तरेत तेव्हा सर्रास दिसायचं. आता आहेत की नाही, माहिती नाही.) त्यानं एका ठिकाणी नेऊन घातलं. तिथनं जाम लवकर रिक्षा मिळेना. अखेर एक रिक्षावाला ठरवला. जाऊन-येऊन व तिथं थांबण्याचे ७५ रुपये ठरले. एकदाचा राठधानात पोचलो. अगदी छोटंसं गाव होतं. शहीद नानकचंदांचं घर शोधून काढलं. त्यांच्या पत्नी गंगादेवी एकट्याच घरात होत्या. मग शेजारच्या एक बाई आल्या. गंगादेवी निरक्षर होत्या. नानकचंद हे हरिजन होते. त्यामुळं ‘आम्हाला मदत मिळताना जातिभेद केला जातोय,’ असं गंगादेवींनी डोळ्यांत पाणी आणून सांगितलं. उत्तर भारतातलं हे भयंकर जातवास्तव असं धाडकन माझ्या अंगावर कोसळलं होतं. मला अस्वस्थ व्हायला झालं. काय करावं ते सुचेचना. गंगादेवींना पाच मुलं आहेत. त्यापैकी एकही घरी नव्हता. थोरल्या मुलाला दिल्ली पोलिसांत नोकरी मिळालीय, असं त्या सांगत होत्या. मग तिथले काही फोटो काढले. त्यांच्या स्मारकाचं कामही रखडलंय. त्यामागचं कारणही त्यांचं दलित असणं हेच होतं. देशासाठी प्राणार्पण केलेल्या या शहिदाच्या नशिबी आपल्या स्वत:च्या गावात एक बरंसं स्मारकही नव्हतं! अस्वस्थ मनस्थितीतच तिथून निघालो.
आता मला पूँठकुलाँला जायचं होतं. तेव्हा अंगात उत्साह बराच होता. सोनीपतहून दिल्लीला पोचेपर्यंत पाच वाजले. लगेच बलवानाला (ते बवाना आहे, हे नंतर कळलं.) जाण्याचा निर्णय मी घेतला. (अतिउत्साह नडतो, तो असा) दोन-चार जणांनी सांगितल्यावरून नरेलाला आधी जाण्याचं ठरवलं. मग आयएसबीटी ते नरेला हा जवळजवळ पावणेदोन तासांचा प्रवास उभ्यानं, असह्य गर्दीत पार केला, हे चांगलंच आठवतंय. (सध्याच्या कोव्हिडकाळात हे नुसतं आठवूनही अंगावर काटा येतो तो भाग वेगळा!) नरेलालाच जाईपर्यंत आठ वाजले होते. अजून पूठकुलाँ दृष्टिक्षेपातही नव्हतं. तरीही लगेच बस मिळाली, म्हणून बवानालाही गेलो. मात्र, तिथं गेल्यावर पूठकुलाँला आणखीन अर्धा तास लागेल, असं कळल्यावर माझा उत्साह संपला. दिल्लीला परत जायला रात्री उशिरा गाड्याही नव्हत्या. मग तिथूनच नाईकांना फोन केला. नंतर पूठकुलाँला उद्या येण्याचं ठरवलं व सरळ दिल्लीची परतीची बस पकडली. ती दहाला आयएसबीटीला पोचली.
गुरुवार, २८ नोव्हेंबर २००२. आज संसद भवनात जायचं होतं. सकाळी साडेदहा वाजता मी संसद भवनात गेलो. कडेकोट बंदोबस्त होता. दोन-अडीच वर्षांपूर्वी मी संसदेत आलो होतो, त्या तुलनेत आता हे फारच जाणवलं. अर्थात माझ्याकडं पास असल्यानं सहज आत जाऊ शकलो. मला ११ नंबरच्या गेटपाशी शहीद जवानांची नावं लावली होती, ती जागा पाहायची होती. पण तिथं फारच सिक्युरिटी असल्यानं जाता आलं नाही. मग प्रेस गॅलरीत जाऊन बसलो. प्रश्नोत्तराचा तास व शून्य प्रहरातली चर्चा ऐकली. पंतप्रधान वाजपेयी राज्यसभेत होते; पण चंद्रशेखर, शरद पवार लोकसभेत पाहायला मिळाले. बाकीही बरेच होते. प्रेस गॅलरीत बागाईतकर होतेच. नंतर नाईकही आले. शून्य प्रहर झाल्यावर एक वाजता संसदेचे तेव्हाचे उपसंचालक (सुरक्षा) व्ही. पुरुषोत्तम राव यांना भेटलो. त्यांच्याकडून सुरक्षाव्यवस्थेबाबत माहिती घेतली. गेल्या वर्षभरात संसदेत वाढवलेल्या सुरक्षाव्यवस्थेची (अर्थात माध्यमांना देणं शक्य आहे इतपतच) माहिती राव यांनी दिली. नंतर राम नाईकांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथं खासदार दिलीप गांधी भेटले. त्यांना गेल्या वर्षी फोनवर घेतलेल्या मुलाखतीची आठवण करून दिली.
संसदेतून लगेच बाहेर पडलो. आज पूँठकुलाँला शहीद ओमप्रकाश यांच्याकडं काहीही करून जायचं होतंच. मग मोरीगेटला गेलो. पण तिथून बवानाला थेट बस नसल्याचं कळलं. मग आझादपूरची बस पकडून तिथं गेलो. तिथून बवानाची बस पकडली. रस्त्यातच पूठकुलाँ गाव अशी पाटी दिसली. मग तिथंच उतरलो. ९७२ नंबरची बस पकडून पूठकुलाँला गेलो. तिथं शहीद ओमप्रकाश (हेडकॉन्स्टेबल) कुणालाच माहिती नव्हते. मी हादरलोच. पण मी सायकलरिक्षानं सुलतानपुरी पोलिस ठाण्यात गेलो. तिथं कळलं, की हे पूठकुलाँ नाही, पूठ खुर्द गाव आहे म्हणून! मग तिथल्या पोलिसानं एक रिक्षा बघून दिली. त्यानं २० मिनिटांत पूठकुलाँला पोचवलं. आता मी योग्य ठिकाणी आलो होतो. त्यामुळं तिथं ओमप्रकाश यांचं घर लगेच सापडलं. त्यांचे म्हातारे आई-वडील भेटले. त्यांच्या पत्नी, मुलगा भेटले. भावाच्या घरी गेलो. अगदी दाटीवाटीच्या वस्तीत असलेलं हे एक साधं घर होतं. ओमप्रकाश दहशतवादी हल्ल्यात मरण पावल्यानं अचानक हे कुटुंब प्रसिद्धीच्या झोतात आलं होतं. इतर माध्यमांचे प्रतिनिधीही येत होते. वाहिन्यांचा एवढा सुळसुळाट नव्हता. तरी मिळणाऱ्या प्रसिद्धीनं ओमप्रकाश यांचं कुटुंब चांगलंच बावरून गेलं होतं, असं आज विचार करताना जाणवतं.
शुक्रवार, २९ नोव्हेंबर २००२. आज उत्तर प्रदेशातील हरिपुरा गावी हुतात्मा घनश्याम गुर्जर यांच्या घरी जायचं होतं. सकाळी सात वाजता नवी दिल्ली रेल्वे स्टेशन गाठलं. कोसीकलाँचं तिकीट काढलं. पावणेआठला आग्रा पॅसेंजर आली. तिच्यात बसलो. ही गाडी अकराला कोसीकलाँ गावात पोचली. तिथून ‘टप्पू’तून हरीपुरा गावात गेलो. गाव अगदी छोटं होतं. रस्त्यातच घनश्याम गुर्जर यांचा मोठ्ठा बंगला लागला. त्यांचा मुलगा बच्चूसिंह भेटला. घनश्याम यांची पत्नी भेटली. आता त्या बंगल्याशेजारीच घनश्याम यांच्या स्मारकाचं काम सुरू आहे. ते बच्चूसिंहनं दाखवलं. आतापर्यंत भेटलेल्या कुटुंबांत नेगींनंतर घनश्याम गुर्जर यांचंच कुटुंब जरा सुस्थितीतलं वाटलं. वडिलांच्या स्मारकासाठी बच्चूसिंह यांनी कंबर कसली होती. इथंही कुणाचं स्मारक होणार, कधी होणार, कसं होणार या सर्वांत जातीचं एक गणित अदृश्यपणे दिसलंच. उत्तर प्रदेशात यापूर्वी एक आग्रा सोडलं, तर मी यापूर्वी कधी गेलो नव्हतो. हरिपुरा हे खऱ्याखुऱ्या उत्तर प्रदेशाचं, एकविसाव्या शतकातलं दर्शन होतं. महाराष्ट्रासारख्या राज्यातून आलेल्या कुणालाही धक्काच बसेल, अशीच तेव्हा तिथली सामाजिक परिस्थिती होती. मी मनातल्या मनात या गोष्टींची नोंद घेऊन पुढच्या मुलाखतीकडं वळलो. आता मला अकबरपूर या गावी शहीद रामपाल यांच्या घरी जायचं होतं. ‘टप्पू’च्या मागं लटकून कोसीत आलो. मग जीपमध्ये बसून पलवलला आलो. तिथून मंडिकौलाला जायचं होतं. एक बस आली. खच्चून भरली होती. शिवाय टपावरही लोक बसले होते. मग त्यात घुसलो. मध्ये तर ती बस पार तिरपी झाली होती. मग कंडक्टरनं वरच्या काही लोकांना खाली उतरवलं. (धन्य धन्य तो उत्तर प्रदेश!) पुढं एका फाट्यावर बस पंक्चर झाली. (आनंदीआनंद!) बरेच लोक खाली उतरले. मीही उतरलो. तेवढ्यात त्या शहाण्या ड्रायव्हरनं लगेच गाडी पुढं ताबडली. मी भयंकर चरफडलो. पण इलाज नव्हता. मग मागून आलेल्या एका जीपच्या साइडपट्टीवर लटकून १५ किलोमीटरवर असलेल्या मंडिकौला गावात गेलो. तिथून अकबरपूरला जायला व परत यायला रिक्षा ठरवली. रामपाल यांच्या घरी (अखेर) पोचलो. त्यांचे भाऊ होते. त्यांच्याशी बोललो. तिथं समोरच रामपाल यांच्या स्मारकाचं व लायब्ररीचं काम सुरू आहे. हे गाव तर पारच छोटं, अगदी वस्ती म्हणावं एवढं लहान होतं. आजूबाजूला सर्वत्र शेती. गावापर्यंत जायला धड रस्ता नाही. संपूर्ण चिखलातून आमची रिक्षा चालली होती. आता या वास्तवाचे तेवढे धक्के बसत नव्हते. रामपाल यांच्या कुटुंबीयांचा निरोप घेऊन सुन्न अवस्थेत निघालो व रात्री दिल्लीला मुक्कामी परतलो.
शनिवार, ३० नोव्हेंबर २००२. आज राजस्थानात नीम का थाना येथे शहीद जगदीशप्रसाद यादव यांच्याकडे जायचं होतं. यापूर्वी या गावाचं नाव मी एका सूर्यग्रहणाच्या वेळीच ऐकलं होतं. या गावावरून ते स्पष्ट दिसणार असल्यानं तिथं तेव्हा बऱ्याच खगोल अभ्यासकांची गर्दी झाली होती, वगैरे मला थोडं आठवत होतं. मात्र, या गावाला जायचा योग कधी येईल असं वाटलं नव्हतं. तो या निमित्ताने आला होता. मग 'अंतर्राज्यीय बस अड्डेपर’ गेलो. तिथं ‘नीम का थाना’कडं जाणाऱ्या गाड्यांची राजस्थानच्या काउंटरवर चौकशी केली, तर तिथल्या माणसानं सराई काले खाँ बसस्थानकावरून या गाड्या सुटतात, असं सांगितलं. अकरा वाजून गेले होते. मी कपाळावर हात मारून घेतला. मग निमूटपणे दुसरी रिक्षा करून त्या स्टँडवर गेलो. तिथं पोचेपर्यंत १२ वाजले. तिथं सीकरची बस एक वाजता सुटत असल्याची माहिती मिळाली. मात्र, एक वाजता बरोबर गाडी निघाली. ‘नीम का थाना’ला जायला ९० रुपये तिकीट होतं. चार तास लागतील, असं कंडक्टर म्हणाला. प्रत्यक्षात दिल्लीतून ‘गुडगाँवा’च्या दिशेनं बाहेर पडेपर्यंतच दोन वाजून गेले होते. ‘नीम का थाना’ला पोचेपर्यंत साडेसहा वाजले होते. मग रिक्षा करून जे. पी. यादव यांच्या घरी गेलो. माझ्या अपेक्षेपेक्षा पुष्कळ मोठ्ठं घर होतं त्यांचं. म्हणजे भरपूर नातेवाइक एकत्र राहत होते. ‘जे. पीं.’चे आई-वडीलही होते. सुरुवातीला वडील कन्हैयालाल हेच माझ्याशी बोलले. ‘जे. पीं.’चा मेव्हणा राजेश यादव (मिसेस प्रेम यांचा भाऊ) हाही तिथंच राहतो. त्यानंही पुष्कळ माहिती दिली. ‘जे. पीं.’ची मुलं अगदी छोटी. थोरला गौरव (पाच वर्षांचा) फारच गोंडस होता. धाकटी गरिमा तर अवघी पावणेदोन वर्षांची आहे. मला गलबलून आलं. ‘जे. पीं.’च्या पत्नीशीही नंतर बोललो. काय बोलणार खरं तर? अवघ्या तिशीच्या या मुलीवर काय प्रसंग आलाय! त्या आता शिक्षिका म्हणून काम करतात. तिथून परत दिल्लीला यायला नऊला बस होती. मला तर ते राहाच, म्हणत होते. पण मी नको म्हटलं. मग गरमागरम (संपूर्ण ‘घी’त माखलेल्या) रोट्या व दाल आणि लोणचं, मिरची असं छान जेवण त्यांनी दिलं. यादव कुटुंबीयांच्या या राजस्थानी आदरातिथ्यानं मी तर भारावून गेलो. मला काय बोलावं, तेच सुचेना. जगदीशप्रसाद यांचे वडील आता थकले होते. त्यांच्या चेहऱ्यावर मुलगा गमावल्याचं अपार दु:ख स्पष्ट दिसत होतं. या कुटुंबाचं आदरातिथ्य आठवतच दिल्लीला जायला निघालो, तेव्हा डोळे नकळत पाणावले होते.
या हल्ल्यात एक महिला कॉन्स्टेबल कमलेशकुमारी याही शहीद झाल्या होत्या. त्यांच्या पतीला भेटायचं होतं. मात्र खूप प्रयत्न करूनही त्यांचा पत्ता मिळाला नाही आणि फोनवर बोलणंही झालं नाही. ते उत्तर प्रदेशात कुठे तरी कनौज किंवा आणखी कुठं तरी असल्याची माहिती उडत उडत मिळाली होती. हा एक अपवाद वगळता, मी सर्व हुतात्म्यांच्या घरी जाऊन आलो होतो. त्यामुळे आता पुण्याला परत निघण्याची तयारी सुरू केली. दोन डिसेंबरला दिल्लीतून पुन्हा गोवा एक्स्प्रेसनं पुण्याला परतलो.
आल्यानंतर दीक्षितसाहेबांना भेटलो. लिहिलेले लेख दाखविले. ‘सप्तरंग’ पुरवणीत ‘जरा याद करो कुर्बानी’ या नावाने दोन आठवडे माझे लेख प्रसिद्ध झाले. या लेखांना वाचकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.
ही असाइनमेंट केली तेव्हा मी २७ वर्षांचा होतो. पत्रकारितेत येऊन पाच-सहाच वर्षं झाली होती. त्या तुलनेत मला ही मोठी संधी संपादकांनी दिली होती. या निमित्ताने मला खूप काही शिकायला मिळालं. आपल्या शारीरिक, मानसिक, वैचारिक क्षमता तपासता आल्या. डोळे उघडे ठेवून, कुठलेही पूर्वग्रह न बाळगता अनुभव घ्यायला शिकता आलं. दिल्ली आणि आजूबाजूच्या हरियाणा, राजस्थान व उत्तर प्रदेशात एकाच वेळी जाता आलं, तिथली लहान लहान गावं, रस्ते, धूळ-माती, शेती-जमीन, जेवण-खाण यांचा अनुभव घेता आला. माणसांचं वागणं-बोलणं, लहेजा, पेहराव-ठेहराव समजले. ही शिदोरी दीर्घकाळ पुरणारी असते. दहशतवादी हल्ल्यात घरातलं माणूस जातं, तेव्हा त्या कुटुंबावर कोसळलेलं आभाळ थेट त्यांच्या डोळ्यांत बघायला मिळालं. या दौऱ्यानंतर माणूस म्हणून मी थोडा अधिक संवेदनशील झालो... त्यामुळं या अविस्मरणीय असाइनमेंटबद्दल मनात कायमची कृतज्ञता आहे!



---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्य शिवार दिवाळी अंक २०२१)

----

24 Oct 2021

मटा संवाद - मिरासदार लेख

मराठी विनोदाचे कथेकरीबुवा
-----------------------------------

द. मा. मिरासदार यांचं नाव घेतल्यावर चेहऱ्यावर प्रसन्न हसू येणार नाही, असा मराठी वाचक विरळा! गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ मराठी मुलखात विनोदाची मिरासदारी गाजविणारा असा दुसरा लेखक झाला नाही. पंढरपुरातील मध्यमवर्गीय पांढरपेशा घरात जन्मलेल्या द. मां.नी आपल्या लेखणीनं महाराष्ट्रातील जनतेचं मनोरंजन केलं. मराठी माणसाला गप्पागोष्टी करणारी माणसं आवडतात. मिरासदार हे गोष्टी सांगणारे लेखक होते. त्या धाग्यातून त्यांनी वाचकांशी फार चटकन नाळ जुळविली. मुळात त्यांचं लेखन या मातीतलं, कसदार, अस्सल आणि इथल्या साध्यासुध्या, भोळ्याभाबड्या गावाकडच्या माणसांच्या गोष्टी सांगणारं होतं. त्यामुळं ते वाचताना आपण आपल्या आजूबाजूलाच एरवी घडणारी एखादी घटना वाचत आहोत, असा भास वाचकांना होत असे. कथा आणि त्यातही विनोदी कथा त्यांनी विपुल लिहिली. या विनोदाच्या माध्यमातून त्यांनी वाचकांचं केवळ रंजन केलं नाही, तर त्याच्या डोळ्यांत शहाणपणाचं, समजुतीचं अंजनही घातलं. त्यामुळंच या कथा वाचताना खो खो हसायला येत असे, तितकंच त्यातल्या काही कथांतील कारुण्य जाणवून डोळ्यांच्या कडा ओलावत असत. कारुण्याची डूब असलेला विनोद सर्वश्रेष्ठ मानला जातो. याचं कारण हा विनोद केवळ खिल्ली उडवत नाही, फक्त टोप्या उडवत नाही किंवा नुसती कुणी थट्टा-मस्करी करत नाही की टर उडवत नाही. तो आपल्याच जगण्यातली विसंगती, कुरूपता, खलप्रवृत्ती हसत हसत दाखवून देतो. वास्तवाचीच, पण शर्करावगुंठित अशी गोळी असते ही! मिरासदारांनी आपल्या विनोदी कथांतून ही गोड गोळी वाचकांच्या गळी उतरविली.
मिरासदार पेशानं शिक्षक होते. त्यांचं बालपण पंढरपुरातल्या गल्ली-बोळांत गेलं. स्वातंत्र्यपूर्व काळातला भारत तो! ग्रामीण संस्कृती आजूबाजूला नांदत होती. देवदेवस्की, रुढी-परंपरा, अंधश्रद्धा, धर्मशास्त्राचा पगडा जबर होता. शिक्षणाचा आणि एकूणच सोयीसुविधांचा बऱ्यापैकी अभाव होता. गरिबी उदंड होती. एकीकडं गांधीजींच्या नेतृ्त्वाखाली देश स्वातंत्र्यासाठी लढत होता, तर दुसरीकडं आपली गावखेडी हजारो वर्षांच्या गावगाड्याच्या, जुलमी जोखडाच्या बेड्या पायी जखडवून तशीच नांदत होती. मिरासदार हे सर्व पाहत होते. ते वीस वर्षांचे असताना देश स्वतंत्र झाला. सर्वांनीच मोकळा श्वास घेतला. शिक्षणाचं वारं वाहू लागलं. अगदी हळूहळू का होईना, पण बदल होऊ लागले. एकीकडं गंगाधर गाडगीळ, पु. भा. भावे आणि अरविंद गोखले यांच्या कथांनी साहित्यातल्या कथाप्रवाहाला नवकथा या बिरुदाखाली नवा साज चढवला होता, तर त्याच वेळी शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर या शिलेदारांच्या जोडीनं द. मां.नी ग्रामीण कथालेखनाच्या क्षेत्रात मुशाफिरी सुरू केली. त्यातही द. मां.नी वाट चोखाळली ती विनोदाची. 'सत्यकथे'ने या नवलेखकांच्या नव्या, ताज्या झुळुकीसारख्या कथांना उदार आश्रय दिला आणि मराठी वाचकांनीही या वेगळ्या, दर्जेदार विनोदी कथांना जोरदार दाद दिली. तिथून द. मा. मिरासदारांची घोडदौड सुरू झाली ती झालीच. 'माझ्या बापाची पेंड'सारख्या कथेनं मराठी वाचकांना तुफान हसवलं. वास्तविक, ग्रामीण जीवनात या गमतीजमती आधीपासून घडतच होत्या. ग्रामीण भागातल्या एक से एक इरसाल, बेरकी नमुन्यांची कमतरता त्याआधीही मुळीच नव्हती. फक्त त्यांना शब्दरूपात बद्ध करून साहित्यात आणण्याचा मान मिळविला तो द. मां.नीच.
पंढरपुरातल्या कथेकरीबुवांचा, कीर्तनकार मंडळींचा प्रभाव द. मां.वर होता. ग्रामीण भागातील देवभोळ्या जनतेला तासन् तास देवादिकांच्या गोष्टींमध्ये रमवून, त्यांची चार घटका करमणूक करण्याची विलक्षण हातोटी या मंडळींमध्ये होती. द. मां.नी त्यांचं सूक्ष्म निरीक्षण केलं होतं. त्यामुळं कथा लिहिताना ती कथाकथनाच्या दृष्टीने कशी रंजक असेल, याची खात्री ते करत असत. किंबहुना आपोआपच तशी रंजक गोष्ट त्यांच्याकडून लिहिली जात असे. पूर्वी गावांकडं करमणुकीचं एकमेव साधन म्हणजे गावातला पार. सांजच्याला या पारावर गावातली अठरापगड लोक जमत आणि तंबाखूच्या चंचीची किंवा विड्यांच्या बंडलांची  देवाणघेवाण करीत त्यांच्यात गावगप्पा रंगत. यात एक कुणी तरी गमतीच्या गोष्टी सांगणारा तरबेज गडी असे आणि बाकी सगळे त्याच्या मज्जेमज्जेच्या कहाण्या ऐकत असत आणि दोन घटका जिवाची करमणूक करत असत. मराठी साहित्याच्या पारावर द. मा. अशा मज्जेमज्जेच्या कहाण्या सांगणारे तरबेज गडी झाले आणि समस्त मराठी जनता आपापल्या टोप्या-पागोटी सावरत, त्यांच्या गोष्टी ऐकून ऐकून हसत-खिदळत बसली. द. मां.चं मोठेपण हे, की त्यांनी केवळ चहाटळ किंवा उगाच चावटपणाच्या गोष्टी सांगून लोकांना हसवलं नाही. 'नव्व्याण्णवबादची एक सफर'मधल्या नाना घोडकेसारख्या अतिरंजित कथा त्यांनी स्वतः कधीच सांगितल्या नाहीत. उलट नानाच्या कहाणीतला करुण झरा त्यांच्याच हृदयातून पाझरत होता, याची जाण मराठी रसिकांनाही होती.
मराठी माणसाच्या स्वभावाची नेमकी नस द. मां. ना ठाऊक होती. शिक्षक म्हणून काम करताना ते बारकाईने समाज न्याहाळत होते. त्यामुळंच त्यांच्या गोष्टींत शिक्षक, शाळा, विद्यार्थी भरपूर येतात. 'व्यंकूची शिकवणी'सारखी धमाल विनोदी कथा त्यांना सुचली यामागं त्यांचा हा पेशाच असणार, यात नवल नाही. शिवाजीचे हस्ताक्षर, ड्रॉइंग मास्तरांचा तास, शाळेतील समारंभ अशा अनेक गोष्टी शाळेतील गमतीजमती सांगणाऱ्या होत्या. याशिवाय द. मां.नी भोकरवाडी नावाच्या काल्पनिक गावाची निर्मिती करून विनोदाचा मोठा मळाच फुलविला. पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यासारखं हे छोटं गाव. तिथले गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, नाना चेंगट, सुताराची आनशी ही आणि अशी कित्येक काल्पनिक पात्रं द. मां.नी केवळ जन्माला घातली नाहीत, तर त्यांच्या विविध कथांमधून ती अजरामर केली. मराठी विनोदी साहित्याचा इतिहास लिहिताना द. मां.च्या भोकरवाडीच्या गोष्टींचा उल्लेख अगदी अपरिहार्य असेल. गावाकडचे एक से एक इरसाल नग, एकेक नमुने त्यांनी अशा काही अस्सल आणि धमाल शैलीत उभे केले, की आजूबाजूला रोजच अशी माणसं पाहणाऱ्यांना आपल्यासारख्या वाचकांना ती वर्णनं वाचून हसून हसून पुरेवाट होत असे. नदीकाठचा प्रकार, निरोप किंवा साक्षीदार या कथांतून तर त्यांनी अगदी साध्या, नित्य व्यवहारातल्या घटनांतील दंभ उलगडून हास्याचे असे फवारे उडविले आहेत, की चकित व्हायला होते. ग्रामीण महाराष्ट्राचं त्यांचं निरीक्षण, आकलन आणि समज केवढी होती, याचा प्रत्यय या कथांमधून येत राहतो.
द. मां.चे महाराष्ट्रावर सर्वांत मोठे उपकार हे, की ते केवळ या कथा लिहून थांबले नाहीत. त्यांनी या कथा महाराष्ट्राला वाचून, सादर करून दाखवल्या. शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकरांबरोबर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत केला आणि सर्वत्र हास्याचं सदासतेज सिंचन केलं. मी स्वतः लहानपणी त्यांच्या या कथाकथनाचा आस्वाद घेतला आहे. संपूर्ण सभागृह कसं हास्यकल्लोळात बुडून जात असे, हे मीही अनुभवलं आहे. ब्रिटिश समाजाबाबत असं म्हटलं जातं, की स्वतःवर विनोद करून हसायला त्या समाजाला चांगलं जमतं. अशा समाजाचं मानसिक आरोग्य उत्तम आहे, असं मानलं जातं. महाराष्ट्राबाबत विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत तरी असंच निश्चितपणे म्हणता येतं. गडकरी-कोल्हटकर-चिं. वि. जोशी यांच्यापासून सुरू झालेली विनोदाची परंपरा अत्रे-पु. लं.नी पुढं नेली. त्याच विनोदाच्या दिंडीचे द. मा. हे महत्त्वाचे मानकरी होते. आपल्याच जगण्याचा आरसा दाखवणाऱ्या कथांवर हसण्याइतका, त्यातलं व्यंग्य समजण्याइतका आणि विसंगती जाणण्याइतका तेव्हाचा समाजही समंजस आणि पोक्त होता, हे द. मां.सारख्या लेखकांचं भाग्यच म्हणावं लागेल. त्यांच्या निर्मळ, निखळ विनोदानं मराठी समाजाची विनोदबुद्धी तजेलदार आणि टवटवीत ठेवली. आपल्यावरच हसण्याचं गमतीदार व शहाणं सुख द. मां.च्या कथांनी आपल्याला मिळवून दिलं, याबद्दल मराठी समाजानं द. मा. व सर्वच विनोदी लेखकांप्रति कायमचं कृतज्ञ असलं पाहिजे.
द. मा. मिरासदारांनी चित्रपट क्षेत्रातही कर्तृत्व गाजवलं. अनेक चित्रपटांच्या कथा-पटकथा व संवाद त्यांनी लिहिले. 'एक डाव भुताचा' हा त्यातला सर्वांत लोकप्रिय व गाजलेला चित्रपट. त्यातल्या हेडमास्तराची भूमिकाही द. मां.नी ठसक्यात केली होती. द. मा. राजकीय विचारसरणीने पक्के उजवे होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होते. युती सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकारानं त्यांच्या परळी वैजनाथ या गावी १९९८ या वर्षी भरलेल्या ७१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. याच सरकारच्या काळात त्यांना मंत्रिपदाचा दर्जा असलेलं एक पदही देण्यात आलं होतं. असं असलं, तरी द. मा. राजकीयदृष्ट्या अतिआक्रमक नव्हते. आपली राजकीय विचारसरणी त्यांनी कधी लपविलीही नाही आणि किळस वाटेल अशा पद्धतीनं मिरवलीही नाही. त्यांचं कथेकरी बुवांचं रूपच मराठी साहित्यरसिकाला भावलं आणि त्यांनाही तेच अधिक आवडत असणार, यात शंका नाही. पंढरपूरचा रहिवास असलेल्या द. मां.ना मराठी विनोदाचे कथेकरीबुवा म्हणायला हरकत नाही. त्यांचं हे सोज्वळ रूप आता पुन्हा कधीच दिसणार नाही, याची खंतही वाटते आणि दुसरीकडं त्यांची ही विनोदी पुस्तकं कायम आपल्या सोबत असतील या विचारानं हलकेच हसूही येतं. मराठी माणूस हसलेला द. मां.ना आवडत असे. तेव्हा हे हसू चेहऱ्यावर ठेवूनच द. मां.चं सतत स्मरण करायला हवं.

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणी, १० ऑक्टोबर २०२१)

---

29 Sept 2021

मटा दिवाळी अंक २०२० - अनुवाद लेख

अनुवादात इनकमिंग जास्त; आउटगोइंग कमी...
---------------------------------------------------------

मराठीत सध्या अनुवादित साहित्य मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्यामुळं मराठी वाचकांना जगभरातील उत्तमोत्तम साहित्य मराठीत सहज वाचायला उपलब्ध होत आहे. असं असलं, तरी संख्या वाढल्यानं त्याचा दर्जावर परिणाम झाला आहे का? मराठीतून इतर भाषांमध्ये किती साहित्यकृती जातात? अनुवादकांची संख्या, प्रमाण किती आहे? या सर्व प्रश्नांचा नामवंत अनुवादक व प्रकाशकांशी चर्चा करून घेतलेला धांडोळा...

........

मराठी भाषेत विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती होत आली आहे. आता तर हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. मराठीत पूर्वीपासून इतर भाषांमधलं साहित्य अनुवादित होऊन येत आहे. इतर भाषांमध्ये, इतर प्रांतांमध्ये, इतर संस्कृतींमध्ये काय चाललं आहे, हे जाणून घेण्याच्या माणसाच्या मूलभूत जिज्ञासेतून हे सगळं परभाषिक साहित्य आपल्याकडे येत असतं. यात अर्थातच इंग्रजीतून भाषांतरित होऊन येणाऱ्या पुस्तकांचं प्रमाण सर्वाधिक आहे. इंग्रजीत विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती होताना दिसते. ती जागतिक भाषा आहे. त्यामुळं जगातील इतर भाषांमधलं साहित्य इंग्रजीत आधी उपलब्ध होतं. याशिवाय मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषा जाणणाऱ्यांचं विपुल प्रमाण आपल्याकडं आहे. त्यामुळं इंग्रजी पुस्तकं सहज अनुवादित केली जाऊ शकतात. अलीकडच्या काळात अनुवाद मोठ्या प्रमाणावर येताना दिसतात. मराठी भाषेतील अनुवादित साहित्याचं स्थान व महत्त्व एकदम वाढल्यासारखं दिसतं आहे. या तुलनेत मराठीतून इतर भाषांमध्ये किंवा मुख्यत्वे इंग्रजीत किती पुस्तकं भाषांतरित होऊन जातात? मराठी साहित्यव्यवहाराचं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुस्तक व्यवहारांमध्ये काय स्थान आहे, मराठीत होत असलेले अनुवाद संख्येने वाढले असले तरी त्याचा दर्जा योग्य तो राखला जातोय का? या आणि अशा अनेक प्रश्नांचा ऊहापोह करण्यासाठी काही नामवंत प्रकाशक व अनुवादकांशी प्रस्तुत लेखकानं चर्चा केली. त्यातून काहीएक चित्र समोर आलं. ते मांडण्याचा प्रयत्न म्हणजे हा लेख.
मराठीत मोठ्या प्रमाणावर होत असलेले अनुवाद ही स्वागतार्ह गोष्ट असली, तरी त्या अनुवादांचा दर्जा राखणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. याशिवाय मराठीतून इतर भाषांमध्ये साहित्य अनुवादित होऊन जाण्यासाठी प्रकाशकांनी पुढाकार घेणं; तसंच लेखकांनी स्वत:ची व्यावसायिक माहिती अद्ययावत ठेवणं, प्रकाशक-लेखकांनी देशभरात फिरणं, इतर भाषांतील साहित्यधुरिणांना भेटणं या गोष्टी सातत्यानं घडत राहायला हव्यात, असा या चर्चेचा एकूण सूर होता. मराठीत दर्जेदार वाङ्मयाची कमतरता नाही येथपासून मराठीत नव्या पिढीत आश्वासक लेखक दिसत नाहीत इथपर्यंत मतं नोंदविली गेली. अनुवाद ही एक गांभीर्यानं करण्याची बाब असून, अनुवादकाला त्या भाषांचं ज्ञान तर हवंच; याखेरीज त्याला दोन्ही संस्कृतींची सखोल माहितीही हवी, हे निरीक्षणही या चर्चेत मांडण्यात आलं.

अनुवादकाला वेगळ्या प्रज्ञेची गरज

मराठी व कन्नड या भाषाभगिनींना जोडणारे अनेक घटक व व्यक्ती आहेत. यात विठ्ठलापासून ते पं. भीमसेन जोशींपर्यंत अनेक उदाहरणे सांगता येतील. याच यादीत अनुवादाच्या क्षेत्रात अतिशय आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे उमा विरुपाक्ष कुलकर्णी. उमाताई कित्येक वर्षांपासून कन्नड पुस्तकं मराठीत अनुवादित करीत आल्या आहेत. या क्षेत्रातला त्यांचा अभ्यास, व्यासंग दांडगा आहे. मराठीतल्या सध्याच्या अनुवाद व्यवहाराबद्दल बोलताना उमाताई म्हणाल्या, “कन्नडमधील साहित्य जसं मराठीत येतं, तसंच मराठीतलंही बरंच साहित्य कन्नड भाषेत भाषांतरित झालं आहे. चंद्रकांत पोकळे यांनीच जवळपास शंभर पुस्तकं कन्नडमध्ये भाषांतरित केली आहेत. विरुपाक्ष कुलकर्णी यांनीही किमान २५ ते २७ पुस्तकं मराठीतून कन्नडमध्ये आणली आहेत. असं असलं, तरी इतर भाषांमधून मराठीत ज्या प्रमाणात अनुवादित साहित्य येतं, त्या प्रमाणात मराठीतून अन्य भाषांमध्ये जाणारं साहित्य तुलनेत कमी आहे. याचं एक कारण असं वाटतं, की आपल्या लेखकांची त्या प्रमाणात चर्चा तिकडं होताना दिसत नाही. आपल्याला भैरप्पा, शिवराम कारंत किंवा गिरीश कार्नाड ही नावं माहिती असतात. त्यांचं काम माहिती असतं. त्या तुलनेत आपल्याकडचे लेखक कमी माहिती असतात. अनिल अवचटांसारख्या लेखकाची केवळ एक किंवा दोनच पुस्तकं त्या भाषेत अनुवादित झाली असतील, तर तिथल्या वाचकांना हा लेखक कसा समजणार? त्याची चर्चा कशी होणार? लेखक हा हिंडता-फिरता पाहिजे. आपल्या लेखकांनी बेंगळुरू, म्हैसुरूमध्ये जायला पाहिजे. त्यांच्या पुस्तकांची प्रकाशनं त्या शहरांमध्ये व्हायला पाहिजेत. तिथल्या लोकांशी, साहित्यिकांशी त्यानं संवाद साधला पाहिजे. असं केलं तर लोकांना त्या लेखकाविषयी कुतूहल निर्माण होईल. त्याच्या पुस्तकांना मागणी वाढेल.”
“मराठीतल्या महत्त्वाच्या प्रवाहांबाबत इतर भाषांमध्ये जरूर कुतूहल होतं आणि आहे,” असं सांगून उमाताईंनी दलित साहित्याचं उदाहरण दिलं. त्या म्हणाल्या, “मराठीत साठोत्तरी काळात दलित साहित्य, स्त्री साहित्य, ग्रामीण साहित्य असे वेगवान प्रवाह निर्माण झाले. त्याबाबत कन्नड साहित्यिकांमध्ये किंवा तिथल्या साहित्य वर्तुळात जरूर चर्चा होत असे. कुतूहल वाटत असे. मात्र, पुढच्या काळात हे कुतूहल टिकवण्याचं किंवा शमवण्याचं काम त्या ताकदीनं करण्यात आपल्याकडचा साहित्यप्रवाह कमी पडला, असं दिसून येतं. आपल्याकडची पुस्तकं तिकडं मोठ्या प्रमाणात अनुवादित होऊन का जात नाहीत, तर मुळात याचं उत्तर असं आहे, की अनुवाद हे वेळखाऊ काम आहे. मीही सुमारे २५ ते ३० लेखकांचं साहित्य अनुवादित केलं आहे. त्यातले काही लेखकच वाचकांपर्यंत पोचले आहेत. याचाही विचार करायला हवा. वेळेचं म्हणून एक ‘अर्थकारण’ असतं. त्यात हे अनुवादाचं काम बसत नाही. मी काही अनुवादाच्या कामावर अवलंबून नाही. माझ्या आनंदासाठी मी हे काम करते. त्यासाठी पुष्कळ वेळ देते. ज्या लेखकाचं पुस्तक अनुवादित करायचंय त्याला त्याच्या शहरात जाऊन किमान एकदा तरी भेटते. त्याचं घर, परिसर, पर्यावरण सगळं पाहते. तो बोलतो कसा, वावरतो कसा याचं निरीक्षण करते. त्यातून प्रवाही अनुवाद करायला मदतच होते. आता एवढा वेळ कुणी देत नाही. खरं तर अनुवाद ही दोघांनी करायची गोष्ट आहे. माझं बरंचसं काम विरुपाक्ष आणि मी, दोघांनी मिळून केलंय. आपल्याकडेही पूर्वी दोघांनी मिळून अनुवाद केल्याची उदाहरणं आहेत. खरं तर आता एवढी सांस्कृतिक घुसळण होते आहे. लोक या प्रांतातून त्या प्रांतात सहजी जातात. आपल्याकडे कॉस्मोपॉलिटन शहरांत तुमच्या शेजारी आपल्या देशातील कुठल्याही प्रांताचा माणूस राहायला येऊ शकतो. त्याच्याशी मैत्री केली तर आणखी एक भाषा आपल्याला समजू शकते. आपल्याकडे अनेक अभ्यासू माणसं आहेत. दोन मैत्रिणींनी दुपारच्या मोकळ्या वेळात एकत्र येऊन अनुवादाचं काम केलं तर काहीच हरकत नाही. पण हे होताना दिसत नाही. अनुवाद वाचणारा फार सहनशील वाचक असतो. मुळात त्याला त्या परक्या भाषेतील साहित्याविषयी काही तरी कुतूहल असतं, म्हणून तर तो ते पुस्तक आणतो. तेव्हा त्याला समाधान मिळेल असं काम तुम्हाला करता आलं पाहिजे. आपल्याकडचं दलित साहित्य सगळीकडं पोचलंय. याचं कारण तेव्हाच्या प्रचलित साहित्यापेक्षा वेगळा काही आशय देण्याचं काम त्यानं केलं. आताचे लेखक असं काही वेगळं देत आहेत का? वाचकांची भूक भागेल असा आशय पुरवत आहेत का? आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्या साहित्यातून मांडत आहेत का? मराठवाड्यातून खूप चांगले नवे साहित्यिक येत आहेत. शेतकरी आत्महत्या ही आपल्याकडची मोठी समस्या आहे. त्यावर खूप वेळ घेऊन, संशोधन करून काही लिहिलं गेलंय का? तसं साहित्य निर्माण झालं तर ते इतर भाषांतले लोकही आवर्जून वाचतील. याखेरीज आपल्याकडचे प्रस्थापित लेखक स्वत: आपल्या साहित्यकृती अन्य भाषांत जाव्यात म्हणून किती प्रयत्नशील असतात? तुम्ही तुमच्या अनुवादकांना कसं वागवता, यावरही खूप काही असतं. अनुवादकाला तो मान मिळायला नको का? अनुवादकाला वेगळ्या प्रकारची प्रज्ञा गरजेची असते. हे खूप गांभीर्यानं, अभ्यास करून, वेळ देऊन करायचं काम आहे.”
“आपल्याकडं एकोणिसाव्या शतकात प्रथम अनुवादाचं एक युग येऊन गेलं. तेव्हा अनुवाद हा शब्दही नव्हता. भाषांतर म्हणत असत. परदेशी साहित्यकृतींना मायबोलीचं सौष्ठव देण्याचं काम या काळात झालं. तेव्हा ती त्या काळाची गरज होती. आता स्वातंत्र्योत्तर काळात अनुवाद ही साहित्यिक गरजेपेक्षा वैयक्तिक गरजेची गोष्ट झाली आहे. मुळात वाचकांची संख्या वाढली आहे. त्यामुळं त्यांच्यात वैविध्य आलंय. त्याला आता केवळ फिक्शन किंवा ललितकला नको आहे. त्याला माहितीपर पुस्तकं हवीत, त्याला पर्यटनावरची पुस्तकं हवीत. स्व-मदत प्रकारातली पुस्तकं हवीत. कालांतरानं ही गरजदेखील कमी होत जाईल,” असं निरीक्षणही उमाताईंनी नोंदवलं.

‘आंतरभारती’चं स्वप्न अधुरंच 

पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे म्हणाले, “आपल्याकडे मुद्रणतंत्र आल्यावर प्रकाशन व्यवहाराचा प्रारंभीचा काळ हा 'अनुवाद पर्व' म्हणावा असाच होता. ब्रिटिश राजवटीच्या प्रभावातून इंग्रजी साहित्य व पुस्तके मराठीत येऊ लागली. याचा अर्थ असा नव्हे, की ही प्रेरणा आपण इंग्रजांकडून घेतली. आपल्याकडे सातव्या व आठव्या शतकापासूनच अनुवाद प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्ञानेश्वरपूर्व काळ आणि नंतरचा म्हणजे बाराव्या शतकानंतर आपणाकडे जास्ती अनुवाद संस्कृतमधून आले. प्राकृत, पाली अशा भाषा त्या वेळीही होत्या. ज्यात भारतीय ज्ञानशाखांचा अभ्यास होत होता. इंग्रजीच्या अगोदर संस्कृतमधून खूप भाषांतरे, अनुवाद, आधारित साहित्य मराठीत आले आहे. मराठीत अनेक नाटकं, काव्यरचना संस्कृतमधून आल्या. मराठीच्या व्याकरणावरही संस्कृत भाषेची मोठी छाप आहे. आपणाकडे व्याकरण, भाषाशास्त्र, साहित्यशास्त्र, काव्यशास्त्र संस्कृतमधून अनुवादित होत गेले व त्यात पुढे कालमानानुसार बदल होत गेले. ब्रिटिशांच्या प्रभावामुळे जे अनुवाद व ग्रंथ भारतीय भाषांत आले त्यावर इंग्रजी साहित्याचा व भाषेचा प्रभाव होता. इंग्रजीव्यतिरिक्त अन्य जागतिक भाषांतील साहित्य मराठीत यायला काही काळ लागला. विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळात आपण रशियन, फ्रेंच व इतर अन्य भाषांतील श्रेष्ठ साहित्यकारांचे अनुवाद आपल्याकडे येऊ लागले. ब्रिटिशांच्या प्रभावात आपणास फक्त शेक्सपिअर श्रेष्ठ वाटत होता; पण पुढे टॉलस्टॉय, दोस्तोव्हस्की, काफ्का, सार्त्र, आल्बेर काम्यू अशा किती तरी श्रेष्ठ लेखकांचा परिचय आपणास होऊ लागला.”
मराठीतून इतर भाषांत कितपत अनुवाद जातात, यावर जाखडे म्हणाले, “हे प्रमाण खूप कमी आहे. परंतु 'नॅशनल बुक ट्रस्ट व साहित्य अकादमीमुळे मराठीतील अनेक पुस्तके इतर भारतीय भाषांत अनुवादित झाली. जगभरातील इतर भाषांत झालेल्या अनुवादित पुस्तकांची संख्या फार कमी आहे. इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश भाषांत काही पुस्तके अनुवादित झाल्याचे दिसते. अर्थातच इंग्रजीत ही संख्या थोडी जास्त भरेल. साधारणत: १५०० ते २००० पर्यंत ही संख्या जाऊ शकेल. मुळात इतर भाषांमधील प्रकाशकांनी आपल्या साहित्यकृतीमध्ये रुची दाखवायला हवी. आपण इतर भाषांमधल्या साहित्यकृतीचे हक्क विकत घेतो, त्यांच्या अटी-शर्ती स्वीकारतो. वास्तविक ही देवाण-घेवाण दोन्ही बाजूंनी व्हायला हवी. भारतीय भाषांतील साहित्य अधिक प्रमाणात यायला हवे. ‘आंतरभारती’ ही संकल्पना मुळात तीच होती. मात्र, ते स्वप्न अपूर्णच राहिलं. त्यातल्या त्यात बंगाली किंवा कन्नड या भाषांसोबतचा आपला साहित्यव्यवहार अधिक राहिला आहे. आम्ही ‘उत्तम अनुवाद’ या आमच्या अंकामधून तोच प्रयत्न करीत आहोत. या भाषांव्यतिरिक्त इतर भाषांमधलं साहित्य आम्ही मराठीत आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. भारतीय व इतर जागतिक भाषांतील पुस्तके मूळ भाषेतून येण्याऐवजी इंग्रजीमार्फत जास्त येतात, ही गोष्ट खटकते. आज अनुवादाची पुस्तके जास्त प्रमाणात प्रत्याशित होत आहेत. परंतु ती अभिजात साहित्याची होत नसून लोकप्रिय पुस्तके अनुवादित होत आहेत. ही वाढ नसून सूज आहे. वैचारिक साहित्याचे अनुवाद आपल्याकडे फार कमी येत आहेत. यामुळे वाङ्मयीन अभिरुचीला पोषक असे काही घडत नाही. विक्री हेच उद्दिष्ट समोर ठेवून पुस्तक मराठीत येत आहेत.”
आपल्याकडचे साहित्य कमी प्रमाणात अनुवादित होऊन बाहेर जाते, याबाबत बोलताना जाखडे म्हणाले, “अनुवादकांची उणीव हे एक महत्त्वाचे कारण आहे. आपल्या शेजारच्या राज्यातील वाङ्मय व सांस्कृतिक व्यवहार आपणास समजत नाहीत, ही गोष्ट चांगली नाही. त्या-त्या राज्यात राहणाऱ्या मराठी माणसांनी सांस्कृतिक दूत बनणे गरजेचे आहे. सर्व विद्यापीठांतील इंग्रजी प्राध्यापकांची जबाबदारी मोठी आहे. परंतु इतर भाषांतील समीक्षा, संशोधन व इतर ज्ञानशाखातील पुस्तकांचे अनुवाद होत नाहीत व आपलेही इतर भाषांत फारसे जात नाही. सध्या उथळ गोष्टींना प्रतिष्ठा देण्याचे षडयंत्र प्रभावी आहे. आज मायथॉलॉजीवरची बरीच लोकप्रिय पुस्तके मराठीत अनुवादित केली जात आहेत. आपल्याकडे डॉ. रा. चिं. ढेरे यांनी आयुष्यभर याच विषयावर प्रचंड काम केले; परंतु सर्वसाधारण संकलन करून अनेक देव-दैवत विज्ञानावरची किरकोळ रंजक पुस्तके आपण विकत घेत आहोत, अनुवादित करीत आहोत. मूळ मराठीतही खूप मोठे काम झाले आहे. हे लक्षात घेऊन बाहेरचे तेवढे श्रेष्ठ हा समज आपण काढून टाकला पाहिजे.”
इतर भाषांतील पुस्तके अनुवादित करताना स्थानिक प्रतिभेला धक्का बसणार नाही व आपल्या भाषेतील साहित्यकारांचा आत्मविश्वास जाणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे, असं मत जाखडे यांनी मांडलं.

प्रकाशकांचा पुढाकार कमी

‘राजहंस प्रकाशना’चे दिलीप माजगावकर म्हणाले, “मराठीतून अन्य भाषांत अनुवाद होऊन जाण्याचं प्रमाण कमी आहे. आम्ही प्रकाशक मंडळी त्याबाबत जेवढे जागरूक असायला हवे आहोत, तेवढे जागरूक नाही आहोत, असा माझा स्वत:वरून अनुभव आहे. आम्ही व्यक्तिगत पातळीवर आमच्या पुस्तकांची जशी विक्री करतो, तशी व्यवस्था करतो तसं अनुवादित पुस्तकं हेही विक्रीचं एक साधन आहे, हे आम्ही लक्षात घेत नाही. वास्तविक हे लेखक व प्रकाशक या दोघांच्याही हिताचं आहे. मराठीत ‘मसाप’सारखी संस्था असेल किंवा सरकारच्या पातळीवर साहित्य संस्कृती मंडळासारखी संस्था असेल, तशा इतर प्रादेशिक भाषांमध्ये त्यांच्या त्यांच्या संस्था निश्चितच असणार. बंगळुरूमध्ये तर कन्नड भाषेची संस्था आहेच. अशा संस्थांशी संपर्क साधणं, त्यांच्याशी देवाणघेवाण करणं अशा गोष्टी आमच्याकडून केल्या जात नाहीत. त्यासाठी आम्ही आमच्या पुस्तकांची माहिती अगदी प्रादेशिक भाषांमधून नाही, तरी निदान इंग्रजीतून तरी त्याची माहितीपत्रकं तयार करून, त्या त्या संस्थांपर्यंत पोचवायला हवी. तिथल्या माणसांशी संपर्क साधून त्यांना हे सांगायला हवं. केरळमधल्या माणसाला मराठीत काय नवं साहित्य आलं आहे, हे माहितीच नसतं. सर्व प्रकाशकांनी हे करायला हवं. इंग्रजी प्रकाशन संस्थांत मराठी माणसं संपादक म्हणून करीत असतील तर त्यांना मराठीतील दर्जेदार साहित्यनिर्मितीविषयी माहिती असतं. इंग्रजी व मराठीत त्या पद्धतीनं देवाणघेवाण होऊ शकते. गुजराती किंवा कन्नड भाषांमधूनही अशी देवाणघेवाण थोड्या प्रमाणात होते. भविष्यात मराठीतून मोठ्या प्रमाणात अन्य भाषांत अनुवाद होऊन पुस्तकं जाऊ शकतील, एवढी उत्तम निर्मिती मराठीत होत असते.”
मराठीत सध्या येत असलेल्या भारंभार अनुवादामुळे दर्जावर परिणाम होतो का, या प्रश्नावर बोलताना माजगावकर म्हणाले, “निश्चितच दर्जावर परिणाम होतो. आता शब्दाला शब्द अशा पद्धतीचं भाषांतर वाचकाला फार रुचत नाही. अनुवाद ही एक वेगळी कला आहे, ते एक वेगळं शास्त्र आहे. अनुवाद करणाऱ्याला दोन्ही भाषा नीट माहिती असायला हव्यात. केवळ कथानकाचा गोषवारा असं रूप त्या अनुवादाला येत असेल, तर आपल्या चिकित्सक वाचकाला ते लगेच लक्षात येतं. मग वाचक अशा अनुवादाला हातच लावत नाहीत. म्हणूनच मोठ्या प्रमाणावर अनुवाद येत असूनही त्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत नाही. सगळ्याच पुस्तकांचा अनुवाद दर्जेदार असतो असं नाही. घाई केली, की संख्यात्मक फायदा मिळाला, तरी दर्जात्मक फायदा मिळतोच असं नाही. त्याच्यावर परिणाम होतोच. त्यासाठी प्रकाशन संस्थांमध्ये वेगळा संपादक असणं आवश्यक असतं. सगळ्याच प्रकाशन संस्थांमध्ये अशी व्यवस्था असतेच असं नाही. मात्र, तशी गरज असते. छोट्या प्रकाशन संस्थांना हा सेटअप परवडत नाही. त्यामु‌ळे दर्जावर परिणाम होणं अपरिहार्य असतंच.”
“अनुवादात मराठीत चरित्रं-आत्मचरित्रं, व्यक्तिमत्त्व विकास, प्रेरणादायी वाङ्मय, आरोग्य किंवा उपयोजित विषय यांना मागणी असल्याचं दिसतं. फार कमी प्रमाणात कथा-कादंबऱ्यांना प्रतिसाद मिळतो, असं दिसतो. भैरप्पांसारखा लेखक अपवाद! कथा-कादंबऱ्यांना मराठी अनुवादातच नव्हे, तर मूळ मराठी साहित्यातही सध्या कमी मागणी दिसते. कथेला तर नाहीच, असा ‘राजहंस’चा अनुभव आहे. इतर प्रकाशकांचा अनुभव कदाचित वेगळा असू शकेल. ते साहित्यप्रकार वाचण्याचं प्रमाण कमी होताना दिसतं आहे. किंबहुना कथा दिवाळी अंक किंवा मासिकातच वाचाव्यात, असं वाचकांनी ठरवलेलं दिसतं. त्यासाठी दोन-तीनशे रुपये खर्च करून पुस्तक घेण्याची त्यांची फारशी तयारी नसते,” असं निरीक्षण माजगावकर यांनी नोंदवलं.

व्यावसायिक तयारीचा अभाव

‘मेहता प्रकाशन’चे सुनील मेहता म्हणाले, “मराठीत इंग्रजीतूनच सर्वाधिक अनुवाद येतात. इंग्रजीव्यतिरिक्त फ्रेंच, जर्मन किंवा इतर भारतीय प्रादेशिक भाषांमधून थेट मराठीत अनुवाद फारसे होत नाहीत. होत असलेच तरी त्याचे प्रमाण एक टक्काही नाही. इतर भाषांमधून असे साहित्य मराठीत आणण्यासाठी मुळात प्रकाशकांकडे ती जाण असायला हवी. हे प्रकाशकांचंच काम आहे. मराठीतूनही इतर भाषांमध्ये अनुवाद होण्याचे प्रमाण फार कमी आहे. लेखक व प्रकाशक यांच्याकडे व्यावसायिकता हवी. आपल्या साहित्यकृतीचं इंग्लिशमधून सिनॉप्सिस तयार हवं. लेखकाचा इंग्रजीतील परिचय तयार हवा. विक्रीचे आकडे माहिती हवेत. आपल्या साहित्यकृतीच्या काही भागांचं भाषांतर करून तयार ठेवलं पाहिजे. एखाद्याला मराठीतून फ्रेंचमध्ये अनुवाद करून हवा असेल, तर फ्रेंचमध्ये भाषांतर करून देण्याची आपली तयारी हवी. हे काम एकट्या-दुकट्या प्रकाशकाचं नाही. भाषा मंत्रालयाचा साहित्य-संस्कृती विभाग, साहित्य महामंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, प्रकाशक परिषद अशा संस्थांनी मोठ्या प्रमाणात हे काम हाती घेतलं पाहिजे. मुळात इतर भाषक साहित्यिकांसोबत देवाणघेवाण व्हायला हवी. त्यांना आपल्या साहित्य संमेलनांना आमंत्रित करायला हवे. आपल्याकडे त्या वर्षी आलेल्या महत्त्वाच्या पुस्तकांचा, पुरस्कार विजेत्या पुस्तकांचा कॅटलॉग तयार हवा. संमेलनांत अशा पुस्तकांची जाहिरात व्हायला हवी. वर्षातून तीन ते चार वेळा हे आदान-प्रदान झालं पाहिजे. केवळ लेखक-साहित्यिकच नव्हे, तर सामान्य माणसांकडंही सांगण्यासारखं बरंच काही असतं. त्यांच्याकडून लिहून घेतलं पाहिजे. त्याचं संकलन केलं पाहिजे. प्रकाशकांनीही फिरलं पाहिजे. फ्रँकफर्टसारख्या जागतिक बुक फेअरला भेट दिली पाहिजे. जागतिक साहित्य व्यवहाराकडे डोळसपणे पाहिलं पाहिजे. तिथल्या घटना-घडामोडी, ट्रेंड जाणून घेतले पाहिजेत. आता मल्टिमीडिया पुस्तकांचाही ट्रेंड येऊ घातला आहे. आपल्याला याची जाण पाहिजे. आपल्या वाचकांच्या संदर्भात काय करता येईल, याचा विचार करत राहिलं पाहिजे.”
अनुवादाचे प्रमाण भरमसाठ वाढल्याने त्याचा दर्जावर परिणाम झाला आहे का, या प्रश्नावर मेहता म्हणाले, “दर्जावर परिणाम झालेला नाही. उलट मोठ्या प्रमाणात अन्य भाषांमधले साहित्य मराठीत आले. प्रकाशक अनुवादावर किती मेहनत घेतात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. अलीकडच्या काळात स्व-मदत प्रकारच्या पुस्तकांची व त्यांच्या अनुवादाची लाटच आली. आयटी इंडस्ट्रीनं हा ट्रेंड आणला. आताच्या वाचकांना सर्व प्रकारचं साहित्य वाचायला हवं असतं. त्यामुळं अनुवाद वाढले. महाराष्ट्रात वाचनसंस्कृती उत्तम आहे, वाढते आहे. उलट ग्रामीण भागात खोलवर प्रकाशक पोचू शकत नाहीत. तिथल्या वाचकांपर्यंत आपण पुस्तकं पोचवू शकलो, तरी खप किती तरी प्रमाणात वाढेल. इतर भाषांमधील साहित्य मराठीत आणताना केवळ व्यावसायिक विचार करून चालणार नाही. आपल्याकडे फारशा येत नसलेल्या उडिया भाषेतील साहित्यही आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आम्ही जाणीवपूर्वक असं काम करतो. अर्थात यासाठी अनुवादकांची नवी, चांगली फळी तयार होणं अत्यंत गरजेचं आहे. इतर भाषांमधून मराठीत अनुवाद कमी होतात, त्याला दोन्ही भाषांची जाण असणाऱ्या अनुवादांचा अभाव हेही एक कारण आहे. इंग्रजी अनुवादकांच्या तुलनेत इतर जागतिक भाषांतील अनुवादकांचे प्रमाण कमी आहे. असे अनुवादक उपलब्ध असतील तर त्यांची एखादी यादी प्रकाशनाकडे असायला हवी.”

आजचा वाचक ‘डिमांडिंग’

मंजुल प्रकाशनाचे चेतन कोळी म्हणाले, “मराठीत सध्या अनुवादित पुस्तके येण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे, यात शंका नाही. यात अर्थातच इंग्रजी भाषेतून सर्वाधिक अनुवाद होतात. त्यानिमित्ताने त्या भाषेतले ‘बेस्ट सेलर’ लेखक मराठीत येतात. ‘अमेझॉन’सारख्या बड्या कंपन्या ठरावीक काळाने त्यांच्या साइटवर वेगवेगळ्या याद्या प्रसिद्ध करीत असतात. त्यात जागतिक पातळीवरून ते अगदी प्रादेशिक पातळीवरील पुस्तकांमधील सर्वोत्कृष्ट खपाचे लेखक कोण, हे प्रदर्शित केलं जातं. जगभरातले प्रकाशक या याद्यांवर लक्ष ठेवून असतात. अनेक वाचकही नियमित या याद्या वाचत असतात. अनेकदा तर वाचकच विशिष्ट पुस्तक प्रकाशकांकडे आणून, हे पुस्तक लवकर मराठीत येऊ द्या, असा आग्रह धरतात. निखळ व्यावसायिक अंगानेच बोलायचं झालं तर मराठी साहित्य व्यवहार या अनुवादित पुस्तकांमुळेच तरलाय, असे म्हटले तर वावगे ठरू नये. मराठीत काही कायमस्वरूपी लोकप्रिय पुस्तके आहेत. उदा. मृत्युंजय! कितीही बिकट काळ असो, अगदी आत्ताचा करोनाचा वाईट कालखंड असो, ही पुस्तके कायम खपत असतात. त्यातून प्रकाशन व्यवसायाला ऊर्जा मिळत असते. हल्लीचा वाचक खूप डोळसपणे, सजगपणे वाचणारा आहे. त्याच्याकडे तंत्रज्ञान आहे, सोशल मीडिया आहे. त्यामुळे जगभरातल्या घडामोडी त्याला सहजच कळत असतात. आजचा वाचक खूप ‘डिमांडिंग’ आहे. त्यामुळे अनुवादित पुस्तके त्याची भूक भागविण्यासाठी आवश्यक आहेत आणि म्हणूनच त्यांचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे.”
अनुवादित पुस्तकांमध्ये कुठल्या प्रकारच्या पुस्तकांना मागणी आहे, याबाबतची आपली निरीक्षणे सांगताना कोळी म्हणाले, “कथा-कादंबऱ्या अशा कल्पित लेखनापेक्षा नॉन-फिक्शन प्रकारातील लेखनाला मराठी वाचकांची मागणी अधिक आहे. सेल्फ-हेल्प गटातील पुस्तके सर्वाधिक खपतात, हे सांगायला नकोच. याशिवाय बिझनेस मॅनेजमेंट, विविध उद्योगपतींची आत्मचरित्रं, लोकप्रिय विज्ञान, युवाल नोआ हरारी यांच्यासारख्या लेखकांची पुस्तकं यांना मोठी मागणी आहे. मराठी माणसांना एकूणच चरित्रं, आत्मचरित्रं वाचायला आवडतात. मराठीतील पुस्तके अन्य भाषांमध्ये अनुवादित होण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. याचे कारण, इतर भाषिक वाचकांना रुची निर्माण होईल, असे साहित्य आधी आपल्याकडे निर्माण व्हावे लागते. त्यानंतर त्यांचा उत्तम अनुवाद व्हावा लागतो. आता ‘मृत्युजय’ ही कर्णाच्या जीवनावरची कादंबरी असल्याने तिला सर्व भारतात वाचक लाभू शकतो. या कादंबरीचे मुख्य भारतीय भाषांत अनुवाद झाले आहेत. मात्र, बहुतेक वेळा हे अनुवाद इंग्रजी अनुवादावरून करण्यात आले आहेत. तमीळ किंवा तेलगूत हे काम करण्यासाठी मराठी व तमीळ किंवा मराठी व तेलगू अशा दोन्ही भाषा तितक्याच सफाईने जाणणारे अनुवादक मिळणे अवघड आहे. अनेकदा काहींना भाषा येत असते, मात्र अनुवादाचे कौशल्य नसते. अनेक जण तंत्रस्नेही नसतात. प्रकाशकांना वेगाने काम करणारे अनुवादक हवे असतात. तेही कौशल्य अनेकांकडे दिसत नाही. त्यामुळं हे अनुवाद इंग्रजीवरूनच करावे लागतात. काही काही पुस्तकं उत्तम असतात. मात्र, अन्य भाषांमध्ये त्यांचा संदर्भ कसा लावावा, असा प्रश्न पडतो. उदा. माडगूळकरांची ‘बनगरवाडी’ ही कादंबरी उत्कृष्ट आहे, यात वादच नाही. मात्र, उद्या तिचा बंगाली किंवा पंजाबीत अनुवाद करायचा झाला, तर किती अडचणी येतील, कल्पना करून पाहा. त्यातले त्या काळाचे, त्या समाजाचे, त्या भौगोलिक पर्यावरणाचे संदर्भ आपण कसे काय अनुवादित करणार आहोत? याउलट ‘पानिपत’सारखी कादंबरी देशभरात वाचली जाऊ शकते, कारण देशभरातील वाचकांना पानिपतची लढाई या ना त्या प्रकारे नक्की माहिती असते. आता तर त्या विषयावर हिंदी सिनेमाही आला आहे. त्यानंतर अशा कादंबऱ्यांचं अनुवाद येतात आणि त्यांचं चांगले स्वागतही होतं, असा अनुभव आहे. आम्ही अलीकडंच विजय आनंद यांच्यावरचं मूळ मराठीतलं चरित्रात्मक पुस्तक हिंदीत आणलं. विजय आनंद हे मोठे दिग्दर्शक होते, पण हिंदीत किंवा इंग्रजीत त्यांचं एकही चरित्र नाही, असं लक्षात आलं. मग मराठी चरित्राचा अनुवाद केला आणि त्याचं त्या भाषेत चांगलं स्वागत झालं. नरेंद्र दाभोलकर यांचं कामही असंच भाषेपलीकडचं आहे. त्यामुळं त्यांची अंधश्रद्धा निर्मूलनावरची अनेक पुस्तकं हिंदीत आली आहेत. याखेरीज आपण मराठी लोक राष्ट्रीय स्तरावर थोडे बिचकतो, असा अनुभव आहे. अनेक नव्या, तरुण लेखकांना राष्ट्रीय स्तरावरच्या योजना, पारितोषिके, संस्था यांची माहितीच नसते किंवा तिकडं आपली पुस्तकं पाठवण्यात ते हलगर्जी करतात. युवा साहित्य अकादमीचे पुरस्कार असतात. आपल्याकडच्या लेखकांना त्यासाठी अर्ज करा, असं सांगावं लागतं. लेखकाकडं स्वत:ची नीट माहिती असली पाहिजे, अपडेट बायोडेटा असला पाहिजे. या आणि अशा अनेक गोष्टी व्यावसायिक सफाईनं केल्या पाहिजेत. मात्र, आपण मराठी माणसं यात कमी पडतो. याला अर्थातच अपवाद आहेत. मराठीत नव्या पिढीत चांगल्या अनुवादकांची संख्याही फार कमी आहे. तरुण मुलांनी या क्षेत्राकडं यायला हवं. अनुवाद म्हणजे अनुसर्जन! त्याकडं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे, तरच चांगले अनुवादक तयार होतील आणि भाषांमधली ही देवाणघेवाण अधिक सर्जनशील व प्रभावी ठरेल, असं वाटतं.”

'सशक्त आशय मिळतो का?'

‘रोहन प्रकाशन’चे प्रदीप चंपानेरकर म्हणाले, “इतर भाषांतून मराठी भाषेत अनुवादित पुस्तकांचं प्रमाण गेल्या वर्ष-दीड वर्षांत थोडं कमी झालेलं जाणवत असलं, तरी मध्यंतरीच्या काळात हे प्रमाण खूपच वाढलं होतं. मात्र, त्याच्या काही अंशानेही मराठी पुस्तकं इंग्रजी किंवा इतर भाषांत अनुवादित होत नाहीत. आजवर काही लोकप्रिय कादंबऱ्या जरूर प्रसिद्ध झाल्या आहेत, विशेषत: ऐतिहासिक! परंतु गेल्या एक-दोन दशकांतली किती पुस्तकं इतर भाषांत गेली आहेत? सार्वकालीन, सर्वसमावेशक असा सशक्त आशय आपण देतो का, हाही प्रश्न आहेच. त्याचप्रमाणे दोन्ही, तिन्ही भाषांवर प्रभुत्व असलेले किती अनुवादक आहेत? ही प्रॅक्टिकल अडचण आहे. त्याचप्रमाणे संशोधनात्मक साहित्य निर्माण करायचं म्हणजे आर्थिक प्रश्न निर्माण होतात. मी १७-१८ वर्षांपूर्वी विजय तेंडुलकरांना सरदार पटेलांचं चरित्र लिहिण्याचं सुचवलं. तेव्हा ते म्हणाले, की त्यासाठीचा संशोधनाचा खर्च एका मराठी आवृत्तीला कसा झेपेल? चार-पाच भाषांत त्याचा अनुवाद व्हायला लागेल. परंतु असे ‘पार्टनर्स’ मी मिळवू शकलो नाही. नंतर इंग्रजीतलं बलराज कृष्ण लिखित पटेलांचं चरित्र मी मराठीत अनुवादित करून घेतलं. ‘यांनी घडवलं सहस्रक’, ‘असा घडला भारत’ हे संशोधनात्मक ग्रंथ मी स्वबळावर साकारले. वेळ आणि पैसे भरपूर खर्चले. परंतु दोन्ही ग्रंथ मी इतर भाषांत नेऊ शकलो नाही. त्याचं कारण सक्षम अनुवादकांची वानवा. (म्हणजे उलटा अनुवाद उदा. मराठी ते इंग्रजी!) आर्थिक कारणांसोबतच मराठी माणसाची मानसिकताही कारणीभूत आहे. तो बाहेरच्या राज्यांत पोचत नाही, फिरत नाही; संपर्क वाढवत नाही. तेव्हा आपलं साहित्य बाहेरच्या जगात जाण्यास अंगभूत मर्यादा पडतात.”

'मूळ साहित्यकृतीशी प्रामाणिक राहायला हवं'

गेली ३३ वर्षे अनुवादाचं काम करणाऱ्या ज्येष्ठ अनुवादक लीना सोहोनी यांनी, अनुवाद करताना अनुवादकाला कोणते कष्ट करावे लागतात, उत्तम अनुवादासाठी काय काय प्रयत्न आवर्जून करावे लागतात, याविषयी सांगितलं. त्या म्हणाल्या, “मराठीत इंग्रजी भाषेतून सर्वाधिक अनुवाद केले जातात. पूर्वी मराठी माध्यमांत शिकलेल्या सगळ्या मुलांचं मराठी व इंग्रजी दोन्ही उत्तम असायचं. त्यामुळं इंग्रजीतून मराठीत अनुवाद करणारे भरपूर अनुवादक मिळू शकतात. एखाद्या साहित्यकृतीचा अनुवाद उत्तम व्हायचा असेल, तर मुळात त्या साहित्यकृतीशी प्रामाणिक राहता आलं पाहिजे. काहीही गाळायचं नाही आणि स्वत:ची काहीही भर घालायची नाही, हे तत्त्व पाळावं लागतं. आपली भाषा, लेखन कितीही उत्तम असलं, तरी अनुवादात स्वत:ची शैली आणण्याचा प्रयत्न करणं टाळलं पाहिजे. अनुवादकाला स्वत:ला बाजूला करून लेखकाची शैली आत्मसात करावी लागते. सुधा मूर्ती यांची अनेक पुस्तकं मी भाषांतरित केली आहेत. त्यांचं इंग्लिश अगदी सोपं, बाळबोध, शाळेतल्या मुलांसारखं आहे. त्याचं भाषांतर करताना भाषेतला तो निरागसपणा जपणं महत्त्वाचं आहे. सध्या अनुवादित पुस्तकांचं पीक आलेलं दिसत असलं, तरी बरीचशी पुस्तकं नवोदित अनुवादकांनी घाईत केलेली दिसतात. त्यामुळं ही पुस्तकं पहिल्या आवृत्तीपुरतीच मर्यादित राहतात. आपल्याला नवे अनुवादक हवे आहेत. मात्र, त्यांनी घाईघाईत काम करणं टाळणं पाहिजे. अनुवाद म्हणजे पुन:कथन. दुसऱ्यांना एखादी गोष्ट समजावून सांगणं. वाचकांना ‘इम्प्रेस’ करणं हे अनुवादकाचं काम नाही. राजकीय पुस्तकांच्या अनुवादात खूप अभ्यास करावा लागतो. संदर्भ तपासावे लागतात. पूरक वाचन करावं लागतं. कॅथरिन फ्रँक यांनी लिहिलेल्या ‘इंदिरा’ या पुस्तकाचा अनुवाद करताना मला या सर्व गोष्टी कराव्या लागल्या. काही गोष्टी अनुभवाने ठरवाव्या लागतात. दोन्ही भाषांच्या संस्कृतीची जाण असली, तर पुष्कळ संदर्भ समजतात. त्याचा उपयोग होतो. एकेका पुस्तकासाठी किमान सहा महिने तरी वेळ द्यावा लागतो. अभ्यास करून अनुवाद केला, की तो वाचकांना आवडतोच.”

'उत्तम अनुवादकांची कमतरता'

औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाचे साकेत भांड म्हणाले, “मराठीत अनुवादांची संख्या वाढली आहे हे निश्चित. मराठीतून अन्य भाषांमध्ये अनुवादाचं प्रमाण कमी आहे. मराठी भाषा आणि ज्या भाषेत अनुवाद करायचा ती भाषा अशा दोन्ही भाषांवर प्रभुत्व असणाऱ्या अनुवादकांची कमतरता हे त्याचं प्रमुख कारण आपण म्हणू शकतो. परंतु त्यासोबतच आणखी एक मुख्य कारण म्हणजे मराठी भाषेतील दर्जेदार साहित्याची इतर प्रांतातील लोकांना ओळख करून देण्यात आपणच कुठे तरी कमी पडतोय. जागतिक दर्जा असलेल्या अनेक साहित्यकृती आजतागायत मराठी भाषेत निर्माण झाल्या आहेत. पण हे साहित्य अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचवायचं कसं याकडे मात्र आपलं तितकं लक्ष नाही. अर्थात काही प्रमाणात असे प्रयत्न सुरू आहेत. भालचंद्र नेमाडे, बाबा भांड, शरणकुमार लिंबाळे, शिवाजी सावंत, लक्ष्मण गायकवाड, रणजित देसाई, व. पु. काळे यांसारख्या प्रथितयश मराठी साहित्याकांक्षा साहित्याचे  इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाले आहेत. त्यामुळे मराठीतून अन्य भाषांमध्ये अनुवाद होण्याचं प्रमाण कमी असलं तरी तसे प्रयत्न मात्र नक्कीच सुरू आहेत. इंग्रजीतून मराठीत अनुवाद होणाऱ्या पुस्तकांची संख्या नक्कीच जास्त आहे. पण त्याव्यतिरिक्त आता हिंदी पुस्तकांचे अनुवादही मराठी भाषेत मोठ्या प्रमाणावर होतायत. त्याचं कारण म्हणजे हिंदी भाषेतही वेगवेगळे विषय सध्या हाताळले जातायत. हिंदीतली नवी पिढी तरुणाईसाठी त्यांना भावेल अशा भाषेत जोमानं लेखन करते आहे. हे साहित्य वाचकही उत्तम रीतीने स्वीकारत आहेत. पण त्याव्यतिरिक्त अन्य भारतीय भाषांमधून मराठी भाषेत होणारे अनुवाद मात्र कमीच आहेत. मी आधी सांगितलं त्याप्रमाणे मराठीसह ती विशिष्ट प्रादेशिक उत्तमपणे अवगत असणारे अनुवादक मर्यादित प्रमाणात आहेत. अर्थात अनेक अनुवादकांनी बंगाली, कानडी, तेलगू, गुजराती या प्रादेशिक भाषांमधल्या उत्तमोत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद केला आहे.”
अनुवादाच्या दर्जाबाबत बोलताना साकेत भांड म्हणाले, ‘‘मराठीत होणाऱ्या विपुल अनुवादांमुळे दर्जावर परिणाम झाला आहे असं थेट म्हणता येणार नाही. परंतु कधी तरी अपेक्षेप्रमाणे दर्जेदार अनुवाद मिळत नाही हेही तितकंच खरं आहे. माझ्या मते अनुवादकांनी अनुवाद करताना चिकित्सक पद्धतीनं अनुवाद करायला हवा. जेव्हा तुम्ही दुसऱ्या भाषेतली साहित्यकृती मराठी भाषेत आणता तेंव्हा मूळ लेखकाला काय म्हणायचंय याचा मथितार्थ लक्षात घेऊन अनुवाद व्हायला हवा. असे अनुवादक मिळणं आव्हानात्मक आहे. अर्थात मराठी वाचक सजग आहे. दर्जेदार आणि दर्जाहीन अनुवादातला फरक त्याला नक्कीच माहिती आहे. त्यामुळे दर्जेदार अनुवादालाच तो पसंती देतो. त्यामुळे भाषेचा दर्जा टिकून राहण्यासाठी दर्जेदार काम होणं आवश्यक आहे.”
“मराठीत सध्या फिक्शन, चरित्रं, आत्मचरित्रं, मोटिव्हेशनल, मॅनेजमेंट, आरोग्यविषयक, मानसशास्त्रविषयक, तसेच व्यक्तिमत्त्व विकासासंदर्भातल्या पुस्तकांचे अनुवाद मोठ्या प्रमाणात वाचले जातात. इंटरनॅशनल बेस्टसेलर्स असलेल्या अनेक पुस्तकांचे अनुवाद आम्ही प्रकाशित केले आहेत. सध्या स्पर्धेचं युग आहे. त्यामुळे प्रेरणादायी पुस्तकांच्या अनुवादांना वाचकांकडून मोठी मागणी आहे. मराठीत सध्या अनेक तज्ज्ञ अनुवादक आहेत. पुस्तकाच्या आशयानुसार ओघवता अनुवाद करणारे अनुवादक विषयाला योग्य न्याय देतात. कामाचा दर्जा सांभाळण्यासाठी त्यांची त्यावर सातत्यानं काम करण्याची तयारी असते. संपादकांशी बोलून त्यात अपेक्षित असलेले बदल करणं, आवश्यक त्या भागावर काम करणं हा अनुवादाच्या प्रक्रियेचाच भाग आहे. रेफरन्ससाठी अनुवादक इंटरनेटचाही सध्या मोठ्या प्रमाणात वापर करतात. अशा अभ्यासू पद्धतीनं केलेल्या अनुवादामुळे दर्जा सांभाळण्यास मदत होते,” असंही भांड यांनी सांगितलं.

‘प्रकाशकांनी संपर्क वाढवावा’

नगरमध्ये राहून गेली अनेक वर्षं व्रतस्थपणे बंगालीतून मराठीत मोठ्या प्रमाणावर पुस्तके अनुवादित करणारे ज्येष्ठ अनुवादक प्रा. विलास गिते म्हणाले, “मराठीतून अन्य भाषांमध्ये कमी प्रमाणात अनुवाद होतात. काही पुस्तकांचा अनुवाद होऊ शकत नाही. उदा. पुलंची पुस्तकं व त्यातला विनोद. याचं भाषांतर करणं अशक्य आहे. अलीकडे शांता गोखले यांनी ‘स्मृतिचित्रे’चा नवा अनुवाद केला आहे. तो चांगलाच झाला असेल. अनुवाद सतत होत राहिले पाहिजेत, कारण भाषा सतत बदलत असते, असं म्हणतात. जुन्या अभिजात पुस्तकांचे अनुवाद परत परत व्हायला पाहिजेत. मात्र, भाषांतराचा दर्जा सांभाळला पाहिजे. अनेक जण ‘ठोकुनी देतो ऐसा जे’ थाटात काहीही भाषांतर करतात. असं करणं चुकीचं आहे. त्यातल्या त्यात साहित्य अकादमी अनेक चांगल्या अनुवादकांकडून भाषांतर करवून घेते. एकानं केलेला अनुवाद दुसऱ्या अनुवादकाकडं तपासायला पाठवते. तो अनुवाद प्रकाशित करावा की नाही, असं विचारलं जातं. माझ्याकडे असे अनेक अनुवाद तपासायला येतात. त्यात अनेक गमतीजमती असतात. मात्र, काटेकोर तपासणी होत असल्यानं साहित्य अकादमीच्या अनुवादांचा दर्जा चांगला असतो. अनेक प्रकाशकही काटेकोर तपासून घेतात. मात्र, कधी तरी संपादकांकडून काही चुका होताना दिसतात. मराठीतून अन्य भाषांत अनुवाद कमी होतात, याचं कारण प्रकाशक संपर्क साधण्यात कमी पडतात, असं वाटतं. प्रकाशकांनी अन्य भाषिक प्रकाशकांशी संपर्क वाढविला पाहिजे. मराठीत बंगाली व कन्नड या भाषांतून मात्र थेट अनुवाद होऊन येण्याचं प्रमाण चांगलं आहे. नॅशनल बुक ट्रस्टसारख्या संस्था मराठी पुस्तकांचे अनुवाद अन्य भाषांत करून घेतात. साहित्य अकादमीही कधी कधी इंग्रजीवरून अनुवाद करून घेऊ पाहते. माझ्याकडे एकदा बिभूतीभूषण बंद्योपाध्याय यांचा कथासंग्रह पाठवला होता. म्हणजे इंग्लिश अनुवाद पाठवला होता. त्याच्यावरून तुम्ही मराठी अनुवाद करा, असं म्हटले होते. मग मी म्हटलं, मला बंगाली येत असताना मी इंग्लिशवरून कशाला करू? मग मी बंगाली पुस्तक मागवून घेतलं आणि त्यावरून अनुवाद करून दिला. त्यांनीही तो प्रकाशित केला. पूर्वी नियतकालिकांमधून मराठी कथांचे वगैरे अनुवाद येत असत. आता हिंदी नियतकालिकंही बंद पडत गेली. साहित्य अकादमीचं ‘समकालीन भारतीय साहित्य’ हे एकच नियतकालिक राहिलं आहे. त्यात अनुवाद प्रकाशित होतात.”
“चांगला अनुवाद करण्यासाठी त्याला मराठी वळण देणं गरजेचं असतं. मी पहिला अनुवाद केला होता तो ‘रवींद्रनाथांच्या सहवासात’ या पुस्तकाचा. तो अनुवाद वाचताना मलाच वाटलं, की हे मराठी वळणाचं झालेलं नाहीय. मग मी पुन्हा तीनशे पानं लिहिली. तरीही वाटलं, की काही ठिकाणी मराठी वळण वाटत नाही. म्हणून परत तीनशे पानं लिहिली. या अनुवादाला नंतर साहित्य अकादमीचा सर्वोत्कृष्ट अनुवादाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला,” असा अनुभव प्रा. गिते यांनी सांगितला.

आश्वासक लेखकांची कमतरता

‘प्रथम बुक्स’च्या मराठी विभागाचे संपादक व अनुवादक सुश्रुत कुलकर्णी आपला अनुभव सांगताना म्हणाले, “अन्य भाषांतून मराठीत अनुवाद होण्याचे फिक्शनचे प्रमाण नॉन-फिक्शनच्या तुलनेत खूपच कमी आहे. मराठीतून अन्य भाषांमध्ये अनुवाद होण्याचे प्रमाण नगण्यच म्हणावे लागेल. पूर्वी मराठीतील अनेक अभिजात पुस्तके, कादंबऱ्या अन्य भारतीय भाषांत व इंग्रजीतही अनुवादित झाल्या आहेत. मात्र, समकालीन लेखनाविषयी बोलायचे झाले तर मराठीत आत्ता तरी संपूर्ण भारतात अपील होईल, असे लेखन करणारा लेखक विरळाच. ही आपली मर्यादा आहे. चाळिशीच्या आतले किती तरुण लेखक मराठीत सध्या आश्वासक लेखन करीत आहेत, असा प्रश्न विचारला तर फार समाधानकारक उत्तर मिळत नाही. इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद मोठ्या प्रमाणात वाचले जातात. मल्याळी भाषेत तर गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ हा खूप मोठ्या प्रमाणात वाचला जाणारा लेखक आहे. आपल्याकडेही आता परदेशांतील मोठमोठ्या लेखकांचे अनुवाद वाचले जात आहेत. मुराकामी किंवा हरारी यांच्या पुस्तकांच्या अनुवादाला चांगली मागणी आहे. मुळात अनुवाद चांगला होण्यासाठी अनुवादकही चांगल्या दर्जाचे हवेत. अनुवादक केवळ शब्दांचा अनुवाद करत नसतो, तर एक संस्कृतीच एका भाषेतून दुसऱ्या भाषेत आणत असतो. त्यामुळं अनुवादकाला दोन्ही भाषा, तेथील प्रदेश, संस्कृती यांचं उत्तम भान असावं लागतं. तसं नसेल तर अनुवादात उणेपणा येऊ शकतो.”
या प्रातिनिधिक चर्चेनंतर मराठी साहित्यातील अनुवाद प्रक्रियेविषयी काही मौलिक निरीक्षणे नक्कीच हाती गवसली. मराठीत सध्या चलती असलेल्या या सा्हित्यप्रकाराविषयी अधिक जागरूकता, अधिक अभ्यास आणि अधिक कुतूहल निर्माण झाले, तर मराठीत उत्तमोत्तम अनुवाद येतीलच; पण महत्त्वाचे म्हणजे मराठीतून अन्य भाषांत चांगल्या साहित्यकृती जातील आणि मराठीतील सकस साहित्यनिर्मितीची चर्चा जगभर होईल. एवढी अपेक्षा फार नसावी!

---


(पूर्वप्रसिद्धी ः महाराष्ट्र टाइम्स दिवाळी अंक २०२०)

---