2 Dec 2023

हंपी डायरी - भाग ३

‘अंजनाद्री’पासून तुंगभद्रेपर्यंत....
---------------------------------------

हंपीत पहिल्याच दिवशी पाहिलेल्या अद्वितीय शिल्पसौंदर्याची स्वप्नं पाहतच रविवारची रात्र सरली. आज सोमवार (२७ नोव्हेंबर) म्हणजे आमचा हंपीतला दुसरा आणि शेवटचा दिवस होता. आजही लवकर उठून आवरलं. साडेआठपर्यंत ब्रेकफास्ट करून आम्ही मंजूबाबाची वाट पाहायला लागलो. हंपीत दक्षिण हंपी आणि उत्तर हंपी किंवा नदीच्या अलीकडील आणि पलीकडील असे दोन भाग आहेत, हे आम्हाला माहिती होतं. आदल्या दिवशी आम्ही दक्षिण किंवा नदीच्या अलीकडचं हंपी पाहिलं होतं. आता आम्हाला उत्तरेला म्हणजे तुंगभद्रेच्या पलीकडे जायचं होतं. मंजूबाबा साधारण नऊ वाजता हॉटेलवर आला. आम्ही लगेच निघालो. पहिला टप्पा होता अंजनाद्री. इथं हनुमानाचा जन्म झाला, असा स्थानिकांचा दावा आहे. (असाच दावा नाशिकजवळील अंजनेरी पर्वताबाबतही केला जातो.) हा सर्व परिसर विरुपाक्ष मंदिर केंद्रस्थानी धरल्यास १२-१३ किलोमीटरच्या परिघात असावा, असा माझा समज होता. प्रत्यक्षात अंजनाद्री आमच्या हॉटेलपासून तब्बल ३२ किलोमीटर दूर होतं. आम्ही बराच काळ रिक्षातून प्रवास करत होतो म्हटल्यावर मी मंजूला विचारलं, तेव्हा त्यानं हे अंतर सांगितलं.
आम्ही साधारण दहा वाजता अंजनाद्री पर्वताच्या पायथ्याशी पोचलो. एखाद्या देवस्थानाजवळ असतात तशी इथंही दोन्ही बाजूंना दुकानं, खाण्याचे स्टॉल आदी होतं. साधारण पर्वतीच्या दीडपट आकाराची ती टेकडी होती.  एकूण ५७५ पायऱ्या होत्या. वर चढून जायचं की नाही, याचा आम्ही विचारच केला नाही. जायचंच हे ठरलं होतं. स्वत:ला आव्हान देण्याचा एक प्रकार करून पाहू, असाही जरा एक विचार होता. सकाळची आल्हाददायक वेळ होती. सुदैवानं ऊन नव्हतं. ढग आले होते. आम्हीही इतरांप्रमाणे ‘जय श्रीराम’ म्हणून त्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. सुरुवातीला उत्साहाने शंभर पायऱ्या चढल्यावर मात्र दम लागला. इथं या पायऱ्या उंच होत्या. मात्र, त्या मार्गावर बऱ्याच ठिकाणी शेड घातलेली होती आणि मधे मधे बसायला बाकही होते. आम्ही थोडं थांबत, थोडं बसत हळू हळू ती टेकडी चढून वर गेलो. नंतरच्या टप्प्यात तर ढग दूर होऊन सूर्य तळपू लागल्यानं घामाघूम व्हायला झालं. मात्र, शेवटचा टप्पा पार केल्यावर स्वत:च स्वत:ला शाबासकी दिली. आपण स्वत:ला अनेकदा कमी लेखतो. मात्र, प्रत्यक्षात वेळ आल्यावर आपण किती तरी मोठ्या गोष्टी सहज करू शकतो. याचाच हा एक छोटा नमुना होता. मी व धनश्री सर्वांत आधी पोचलो. थोड्या वेळानं साई व वृषाली आले. इथं अनेक स्थानिक भाविक हा पर्वत अनवाणी चढताना पाहिले. खाली एक चप्पल स्टँड दिसलाही होता. मात्र, आम्हाला स्पोर्ट शूज घातल्याशिवाय इथं चढणं अवघड वाटलं होतं. आम्हाला वर येतानाही अनेक स्थानिक मंडळी शूज का घातले आहेत, असं खुणेनं विचारत होती. मात्र, आम्ही इतर काही पर्यटक आमच्यासारखेच शूज घालून उतरतानाही पाहत होतो. तेव्हा अनवाणी चालणं हे ऐच्छिक असावं, अशी आपली आम्ही सोयीस्कर समजूत घालून घेतली आणि तसेच वर चालत राहिलो. वर देवळाच्या शेजारी शूज अर्थातच काढून ठेवले. इथं माकडं भरपूर आहेत. देवळाच्या थोड्याशा सावलीखेरीज तिथं सावली कुठंही नव्हती. आम्ही तिथंच थोडा वेळ टेकलो. जरा काही तरी खावं, म्हणून जवळची राजगिरा वडी काढून खाल्ली. वृषालीनं ती लगेच न खाता हातातच ठेवली होती. त्यामुळं एक माकडाचं पिल्लू टुणकन उडी मारून तिच्या पायावरच येऊन बसलं. त्याबरोबर आम्ही सगळेच दचकलो आणि थोडासा आरडाओरडा झाला. अर्थात मी लगेच तिला सांगितलं, की हातातली वडी देऊन टाक. तिनं ती वडी त्या पिल्लाला दिल्याबरोबर ते लगेच उडी मारून तिथून पसार झालं. नंतर पुन्हा आम्ही उतरेपर्यंत एकही खाण्याचा पदार्थ सॅकमधून बाहेर काढला नाही. नंतर मंदिरात गेलो. शेजारी नारळाच्या तुकड्यांचा ढीग पडला होता. समोर एक मोठी घंटा टांगली होती. त्यापुढे संरक्षण म्हणून लावलेल्या जाळीला अनेक नवसाचे कापडाचे तुकडे बांधलेले दिसत होते. त्यापलीकडे मोठी दरी होती. तिथं भन्नाट वारा येत होता. खाली तुंगभद्रेचं विशाल पात्र (सध्या जरा रोडावलेलं) आणि हिरवीगार भातशेती, त्यात डुलणारे माड असं देखणं निसर्गचित्र दिसत होतं. मी किती तरी वेळ तिथं उभं राहून ते न्याहाळत होतो. समोरचे डोंगर आपल्यासारखे नव्हते. तिथं सगळीकडं फक्त मोठमोठ्या शिळाच पडलेल्या दिसत होत्या. लहानग्या हनुमानानेच बालपणी खेळ म्हणून खेळून ही सगळी रचना केली आहे, हे मंजूबाबानं आम्हाला येतायेताच सांगितलं होतं. आम्हीही त्यावर भक्तिभावाने माना डोलावल्या होत्या. मला त्या सगळ्या परिसराचीच भौगोलिक रचना (टोपोग्राफी) अतिशय विलक्षण, वेगळी वाटत होती. आम्ही मारुतीरायाचं दर्शन घेऊन बाहेर आलो. मला ‘भीमरूपी महारुद्रा’ सगळ्यांनी एकत्र म्हणावंसं वाटू लागलं. सलीलनं केलेलं या स्तोत्राचं नवं गाणंही आठवलं. नंतर त्या टेकाडावर मंदिराच्या विरुद्ध बाजूला केलेल्या पॉइंटवर जाऊन फोटोसेशन केलं. अजून थोडं वर चढून गेलं, की त्या सगळ्या शिळा दिसत होत्या. तिथंही जाऊन आलो. आता ऊन वाढलं होतं. आम्ही आता उतरायला लागलो. उतरणं तुलनेनं सोपंच होतं. वर येताना धनश्रीला एक जर्मन तरुणी भेटली होती. इतरही काही परदेशी पाहुणे दिसत होते. आम्ही उतरताना अनेक लोक वर येताना दिसत होते. मात्र, आता उन्हामुळं त्यांची बऱ्यापैकी दमछाक होतानाही दिसत होती. आम्ही टणाटण उड्या मारत आता उतरत होतो. वीस-एक मिनिटांत आम्ही खाली आलोही.

मंजूला फोन लावला. तो दोन मिनिटांत आला. तोवर आम्ही उसाचा रस घेऊन जीव शांत केला. मंजू आल्यावर आता पुढचा टप्पा होता तुंगभद्रेत कोराईकल राइडचा. कोराईकल म्हणजे त्या बांबूच्या टोपल्या. एका टोपलीत साधारण पाच ते सहा लोक बसू शकतात. याला खालून डांबर लावलेलं असतं. या गोल टोपलीतून नदीत चक्कर मारतात. ही राइड हंपीत आल्यावर अगदी ‘मस्ट’ असते. मंजूबाबा आम्हाला एका ठिकाणी घेऊन गेला. समोर तुंगभद्रेचं दर्शन झालं. तिथं दगडांमुळं आपोआप एक नैसर्गिक बांध तयार झाला होता आणि पाणी त्यावरून खळाळत, धबधब्यासारखं उड्या मारत पुढं चाललं होतं. आम्ही कोराईकल राइडवाल्याकडं चौकशी केली, तर त्यानं २०-२५ मिनिटांच्या राइडचे प्रत्येकी ७५० रुपये सांगितले. हे पैसे जास्त होते आणि आम्हाला मान्य नव्हते. तेवढ्यात तिथं एक गोरा आला. आम्ही त्याच्याशी गप्पा मारायला लागलो. तो जर्मनीहून आला होता. आमचं हे बोलणं ऐकून त्या कोराईकलवाल्याला वाटलं, की आम्ही त्याच्याबरोबर ‘डील’ करतोय. एकूण आम्हाला त्याचा रागच आला आणि आम्ही तिथली राइड न घेता परत निघायचं ठरवलं. तो गोराही माघारी निघाला. 
मंजूला जरा वाईट वाटलं असावं. अर्थात आम्ही त्याच्या भावनेचा आत्ता विचार करत नव्हतो. आता जेवायची वेळ झाली होती. मग मंजू आम्हाला  जेवायला एका झोपडीटाइप ‘व्हाइट सँड’ नावाच्या रिसॉर्ट कम हॉटेलात घेऊन गेला. इथं आधीच काही गोरे तरुण-तरुणी येऊन पत्ते खेळत बसले होते. इथला पोरगा चांगला होता. हे हॉटेलही वेगळं होतं. इथं आपल्या बैठकीसारखी मांडी घालून बसायची व्यवस्था होती. तिथं काही वाद्यंही ठेवली होती. त्या पोरानं आम्ही सांगितलेली ऑर्डर घेतली. सूप, पिझ्झा, पास्ता असं सगळं कॉन्टिनेंटल फूड खाल्लं. एकूण मजा आली. लंच झाल्यावर मंजू आम्हाला अजून एका ठिकाणी घेऊन गेला. आम्ही आता कुठं चाललोय, हे माहिती नव्हतं. थोड्याच वेळात एका टेकाडावर आम्ही पोचलो, तर डाव्या बाजूला धरणासारखी छोटीशी भिंत लागली. हा सनापूर तलाव होता. इथंही कोराईकल राइड मिळते. हा तलाव अतिशय सुंदर होता. चारही बाजूंनी डोंगर आणि मधोमध बशीसारख्या आकारात हा तलाव होता आणि तोही दोन भागांत होता. मधल्या चिंचोळ्या पट्टीवर गाड्या पार्क केल्या होत्या. आम्हीही तिथं पोचलो. मगाशी आमची राइड न झाल्यानं मंजू आम्हाला इथं घेऊन आला होता. इथल्या राइडवाल्याने एक हजार रुपये सांगितले. आम्ही आनंदानं तयार झालो. चौघांनाही त्यानं त्या टोपलीत बसवलं. आधी लाइफ जॅकेट्स दिली. आधी जरा धाकधूक वाटत होती. आमचा नावाडी म्हणजे एक वयस्कर काका होते. ते फारसे बोलत नव्हते. यांचा मालक किनाऱ्यावर उभा राहून प्रत्येक ग्राहकाशी डील करत होता. आमच्या आधी एक फॅमिली राइड सुरू करून तलावाच्या आत गेली होती. मग आम्हीही निघालो. ही टोपली दोन-अडीच फूट एवढीच खोल असल्यानं आपण जवळपास पाण्याला समांतर तरंगत असतो. पाणी अगदीच जवळ असतं. त्यामुळं सुरुवातीला मला तरी जरा टरकायला झालं. मात्र, लगेच व्हिडिओ, फोटो आदी गोष्टींत मी गुंतवून घेतलं. जरा आत गेल्यावर त्या दुसऱ्या राइडच्या लोकांना त्या नावाड्यानं जोरजोरात गोल गोल फिरवायला सुरुवात केली. आम्हाला ते बघून एकाच वेळी मजा आणि थोडी भीतीही वाटली. थोड्याच वेळात आम्ही दोन्ही टोपल्या एकमेकांच्या जवळ आलो. त्या टोपलीतली फॅमिलीही मराठीच होती. मग मोबाइलची देवाणघेवाण झाली आणि एकमेकांचे व्हिडिओ वगैरे काढणं झालं. एकूण धमाल अनुभव होता. साधारण अर्ध्या तासात आम्ही बाहेर आलो. अगदी बाहेर पडताना त्या टोपल्यांच्या मालकानं आमचे मोबाइल घेऊन पुन्हा सगळ्यांचे फोटो काढून दिले. बाहेर पडल्यावर आम्ही मंजूला धन्यवाद दिले. 

इथून आम्ही पंपा सरोवर बघायला गेलो. हे सरोवर सनापूर तलावासारखंच मोठं असेल असं मला वाटलं होतं. प्रत्यक्षात ते अगदीच छोटं आणि सर्व बाजूंनी दगडांनी बारवेसारखं बांधलेलं निघालं. इथं वर एक मंदिर होतं. मी एकटाच तिथं गेलो. लक्ष्मीचं आणि आणखी एका देवतेच्या मूर्ती होत्या. मी लांबूनच नमस्कार करून निघालो. वर ‘शबरीची गुहा’ आहे, असं काही जण बोलताना ऐकलं. मात्र, तशी कुठलीही माहिती तिथं लिहिलेली नव्हती. त्यामुळं मी तिकडं वर गेलो नाही. याही ठिकाणी भरपूर वानरं होती. इथं थोडा वेळ रेंगाळून आम्ही पुढं निघालो. आता आम्ही हंपीत जाऊन काल राहिलेली दोन मंदिरं (हजारीराम व भूमिगत शिवमंदिर) बघणार होतो. जाताना मंजूबाबा आम्हाला अनेगुंदी गावात घेऊन गेला. या गावात कृष्णदेवरायांचे वंशज अजूनही राहतात. तिथला टाउन हॉल, कृष्णदेवरायांच्या वंशजांचा भलामोठा वाडा हे सगळं बाहेरूनच बघितलं. त्या गावाच्या चौकात कृष्णदेवरायांचा पूर्णाकृती पुतळा आहे. तिथं थांबून मी त्या पुतळ्याचा फोटो काढला.
यानंतर आम्ही पुन्हा हंपीकडं निघालो. अंतर बरंच होतं. पण हा रस्ता सुंदर होता. तुंगभद्रेवरचा मोठा पूल ओलांडून आम्ही ‘अलीकडं’ (म्हणजे दक्षिणेला) आलो. दोन्ही बाजूंनी भातशेती, नारळाची झाडं यामुळं कोकणाचा भास होत होता, तर काही ठिकाणी ज्वारी किंवा उसामुळं देशावर असल्याचा भास होत होता. थोडक्यात, हंपी परिसरात कोकण व देशाचं उत्कृष्ट मिश्रण पाहायला मिळत होतं. शिवाय वातावरण उत्तर भारतातल्यासारखं थंडगार, आल्हाददायक! आम्ही पुन्हा ३०-३२ किलोमीटरचा प्रवास करून हंपीत शिरलो. या वेळी सुरुवातीला पान-सुपारी बाजार नावाचा एक भाग बघितला. तिथून समोरच ‘हजारीरामा’चं मंदिर आहे. नावाप्रमाणे इथं रामायणातील अक्षरश: हजारो प्रसंग कोरले आहेत, म्हणून हा ‘हजारीराम’. आशुतोष बापटांच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, ‘हजारी’ हे फारसी नाव या मंदिराला नंतर पडलं असावं. शिवाय हे मंदिर म्हणजे राजघराण्याच्या खासगी प्रॉपर्टीचा भाग होतं. त्यामुळं ते दीर्घकाळ चांगलंही राहिलं होतं. आम्ही गेलो तेव्हा संध्याकाळचं सुंदर पिवळंधमक ऊन त्या मंदिरावर पडलं होतं. त्यामुळं त्या शिळांना अक्षरश: सुवर्णाचं लेणं चढवल्यासारखं वाटत होतं. तिथं कोणी तरी ड्रोननं त्या मंदिराचं चित्रीकरण करत होतं. त्या कर्कश आवाजानं मात्र आमचा रसभंग झाला. मंदिर मात्र फारच सुंदर होतं. मंदिराशेजारी भरपूर हिरवळ राखली आहे. आम्ही तिथं जरा वेळ शांत बसलो. सूर्य हळूहळू कलायला लागला होता. आता आम्हाला अजून एक-दोन ठिकाणं बघायची होती. त्यामुळं ‘हजारीरामा’ला ‘राम राम’ करून आम्ही तिथून बाहेर पडलो. बाहेर एक पुस्तकविक्रेता होता. आमचं मराठी ऐकून तोही मोडक्या-तोडक्या मराठीत आम्हाला पुस्तक घेण्याचा आग्रह करू लागला. माझ्या एका भाचीसाठी हंपीची माहिती देणारं एक इंग्लिश माहितीपुस्तक घेतलं. तिथून निघालो.
मंजूबाबानं आता आम्हाला त्या भूमिगत शिव मंदिराकडं नेलं. काल आम्ही हे विरुपाक्ष मंदिराकडं जाताना पाहिलं होतं. आज तिथं आत गेलो, तर फार कुणी नव्हतं. मंदिर जमिनीच्या पातळीच्या खाली असल्यानं आणि हळूहळू सूर्य मावळतीकडं निघाल्यानं तिथं जरा अंधारच होता. तरी मी आत आत जात गाभाऱ्यापर्यंत गेलो. तिथं नंदी तेवढा दिसला. पण आजूबाजूला पाणी होतं. त्यापलीकडचा गाभारा दिसलाच नाही. तिथूनच माघारी फिरलो. मंदिर सुंदर होतं यात वाद नाही; पण त्या वातावरणामुळं आणि निर्मनुष्य असल्यानं उगाच काही तरी गूढ वगैरे वाटत होतं. आम्ही लगेच तिथून बाहेर पडलो. आता मंजूबाबा आम्हाला कृष्ण मंदिरात घेऊन गेला. हाही एक अप्रतिम असा शिल्पसमूह आहे. आम्ही गेलो, तेव्हा तिथं कुणीही नव्हतं. आम्ही शांतपणे ते सगळं मंदिर फिरून पाहिलं. या मंदिरासमोरच ‘कृष्ण बाजार’ आहे. इथून मंजू आम्हाला हेमकूट टेकडीकडं घेऊन निघाला. तिथं त्या टेकाडाच्या चढावरच एक गणपतीची मोठी पाषाणमूर्ती आहे. मला नगरच्या विशाल गणपतीची किंवा वाईच्या ढोल्या गणपतीची आठवण झाली. साधारण तेवढ्याच उंचीचा हा गणपती होता. त्याला नमस्कार करून आम्ही टेकडी चढायला सुरुवात केली. हेमकूट टेकडीवरून सगळं हंपी दिसतं. शिवाय हा ‘सनसेट पॉइंट’ही आहे. नेमका त्या दिवशी सूर्य ढगांत लपला होता. त्यामुळं सूर्यास्त असा दिसलाच नाही. वरून हंपीचा सगळा नजारा मात्र अप्रतिम दिसत होता. उजव्या बाजूला विरुपाक्ष मंदिराचे गोपुर दिसत होते. आता तिथला वरचा तो पिवळाधमक दिवाही प्रकाशमान झाला होता. सहा वाजून गेले होते. तिथला सुरक्षारक्षक सगळ्या लोकांना खाली हाकलायला आला. सूर्यास्तानंतर इथली सगळी ठिकाणं पर्यटकांना बंद होतात. आम्हाला खरं तर तिथं थोडा वेळ रेंगाळायचं होतं. पण तो गार्ड आल्यामुळं मी व धनश्री लगेच खाली यायला निघालो. साई व वृषाली थोड्या वेळानं खाली आले. त्यांना तो तुंगभद्रेच्या काठी भेटलेला जर्मनीचा गोरा पुन्हा भेटला होता. म्हणून मग ते रेंगाळत त्याच्याशी गप्पा मारत आले होते.
आता आमचं ‘साइट सीइंग’ असं संपलं होतं. उगाच हुरहुर वाटत होती. मंजूबाबा आता आम्हाला घेऊन तडक हॉटेलकडं निघाला. त्यानं पावणेसातला बरोबर आमच्या हॉटेलवर आणून सोडलं. आम्ही त्याचे पैसे दिले. दोन दिवस त्यानं चांगलं ‘गाइड’ केलं, म्हणून त्याचे आभार मानले. 
आज आम्हाला संध्याकाळी होस्पेट शहरात जरा चक्कर मारायची होती. म्हणून थोडं आवरून आम्ही कार काढून बाहेर पडलो. होस्पेट शहरात दोनच प्रमुख रस्ते दिसले. त्यातला एक बसस्टँडला काटकोनात असलेला रस्ता बराच मोठा होता. इथं मोठमोठ्या ब्रँडच्या शो-रूम दिसत होत्या. ‘शानबाग’ नावाचं मोठं हॉटेल दिसलं. पलीकडंच त्यांचं रेस्टॉरंटही होतं. शानबाग, पै, कामत, कार्नाड ही सगळी चित्रापूर सारस्वत मंडळी. मूळची कारवारकडची. यांचं इकडं व्यवसायांपासून सगळीकडं मोठं प्रस्थ दिसतं. आम्ही त्या हॉटेलमध्ये शिरलो. तिथं ‘नॉर्थ इंडियन’ खाण्याचा विभाग पहिल्या मजल्यावर होता. मग तिकडं गेलो. तिथला वेटर जरा बडबड्या होता. त्याच्याशी गप्पा मारत जेवलो. जेवण चांगलं होतं. दिवसभर आमची दमछाक बरीच झाली होती. त्यामुळं आम्ही व्यवस्थित जेवलो. मी नंतर डाळिंबाचं ज्यूस घेतलं. तेही भारी होतं. 
तिथून निघालो. शहरात आणखी एक फेरफटका मारून आम्ही हॉटेलवर परतलो.

विजापूरचा गोल घुमट

येताना विजापूर (आता विजयपुरा), सोलापूरमार्गे पुण्याला जाऊ, असं आम्ही ठरवलं. वेगळा भाग बघायला मिळेल, हा उद्देश. मग मंगळवारी सकाळी लवकर आवरून साडेसहा वाजताच होस्पेट सोडलं. होस्पेट ते विजापूर रस्ता चौपदरी व उत्कृष्ट आहे. सकाळी सातच्या सुमारास आम्हाला रस्त्यावर एकदम धुकं लागलं. ते आठ-दहा किलोमीटरपर्यंत होतं. मग पुन्हा विरलं आणि नंतर काही अंतरावर पुन्हा लागलं. रात्री तिथं पाऊस पडून गेला असावा. पण असं रस्त्यात मध्येच सुरू होणारं आणि संपणारं धुकं मी तरी पहिल्यांदाच पाहिलं. आम्ही मधे इलकल नावाच्या गावात थांबून ब्रेकफास्ट केला. पुढं रस्त्यात डाव्या हाताला मोठं अलमट्टी धरण लागतं. बरोबर दहा वाजता विजापुरात पोचलो. आम्हाला इथला गोल घुमट बघायचा होता. विजापूर हे आडवं पसरलेलं शहर आहे.

बायपासवरून आम्हाला तो घुमट लांबूनही दिसत होता. मग तिथं गेलो. प्रत्येकी २५ रुपयांचं तिकीट काढून आत गेलो. तिथं एक संग्रहालयही आहे. ते बघायला आम्हाला वेळ नव्हता, म्हणून तिकीट काढलं नाही. थेट गोल घुमटापाशी गेलो. इथं चपला, बूट बाहेर काढायला लागतात. ही विजापूरच्या आदिलशहाने बांधलेली वास्तू. शिवकाळात स्वराज्याच्या शत्रूचं प्रमुख ठाणं. मनात वेगवेगळे विचार येत होते. याच परिसरात अफजलखानाने महाराजांना मारण्याचा विडा उचलला. इथंच स्वराज्याच्या शत्रूच्या मसलती होत असणार. ती इमारत अजूनही भक्कम व बुलंद होती. आम्ही त्या छोट्या जिन्याने चार-पाच मजले चढून पार त्या घुमटापाशी गेलो. हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा घुमट आहे म्हणे. साधारण ३९ मीटर एवढा त्याचा व्यास आहे. तिथं येणारे प्रतिध्वनी, टाळ्यांचे आवाज हे सगळं अनुभवलं. व्हिडिओ केले. मात्र, आम्हाला ‌फार वेळ नव्हता. मग लगेच खाली उतरलो आणि बाहेरच पडलो. आम्ही साधारण तासभर तिथं होतो.
तिथून सोलापूर ९८ किलोमीटरवर आहे.  पुढे भीमा नदी लागते. तीच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आहे. ती ओलांडून आम्ही महाराष्ट्रात प्रवेश केला. सोलापुरात आता बायपास झाल्यानं शहरात प्रवेश करावा लागतच नाही. आम्ही सोलापूर ओलांडून पुढं आल्यावर डाव्या बाजूला एका हॉटेलात थांबून जेवलो. इथून पुढं कार मी चालवायला घेतली. थोड्या अंतरावर गेल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. हा पाऊस साधारण १५-२० किलोमीटरच्या पट्ट्यात होता. पुढं पुन्हा ऊन. यवतला पाच वाजता चहाला थांबलो. इथून पुढं पुन्हा साईनं कार घेतली. पुण्यातलं ट्रॅफिक झेलत साडेसात वाजता घरी सुखरूप पोचलो.
हंपीची आमची ही सहल चांगली झाली. मात्र, आमचं केवळ हंपीच बघणं झालं. बदामी, पट्टदकल, ऐहोळे वगैरे राहिलं. त्यामुळं पुन्हा एकदा तिकडं जावंच लागणार. हंपीला थंडीच्या सीझनमध्येच जावं. तिथं चालण्याची तयारी ठेवावी. ‘पाय असतील तर हंपी पाहावे, डोळे असतील तर कनकपुरी आणि पैसे असतील तर तिरुपती बालाजी’ अशी एक म्हणच तिकडं आहे. तेव्हा भरपूर चालावे लागते. शक्यतो स्थानिक गाइड घ्यावा. नाही तर फार काही माहिती समजत नाही. शिवाय जेवण्यापासून ते खरेदीपर्यंत अनेक ठिकाणी हे स्थानिक लोक आपल्याला मदत करतात. हंपीला जायचं असेल, तर आता सोलापूर-विजापूर मार्गेच जावे. रस्ता सर्वत्र उत्तम आहे. या मार्गे ५४० रुपये टोल (वन वे) लागतो, तर बेळगाव मार्गे हाच टोल (वन वे) तब्बल ११२५ रुपये एवढा लागतो. स्वत:चं वाहन न्यायचं असेल तरी उत्तम; मात्र, शक्यतो दोन चांगले ड्रायव्हर असावेत. एकूण अंतर पुण्याहून ५६५ किलोमीटर आहे आणि दोन ते तीन ब्रेक (साधारण दोन ते अडीच तासांचे) धरले तर बारा ते साडेबारा तास सहज लागतात. सकाळी लवकर प्रवास सुरू करणे उत्तम. 
हंपी हे युनेस्कोने जाहीर केलेले वारसा स्थळ आहे. ते आवर्जून पाहायला हवे. आपल्या देशाचा वैभवशाली सुवर्णकाळ तिथल्या पाषाणांत कालातीत, शिल्पांकित झाला आहे. त्याचं दर्शन घेणं हा शब्दश: ‘श्रीमंत’ करणारा अनुभव आहे, यात वाद नाही.


(समाप्त)

--------------------

1 Dec 2023

हंपी डायरी - भाग २

विठ्ठल ते विरुपाक्ष...
------------------------


विठ्ठल मंदिराच्या त्या प्रांगणात आम्ही प्रवेश करताक्षणीच एक जाणवलं, की आपण एका वेगळ्या दुनियेत आलो आहोत. खरं तर समोर पर्यटकांची गर्दी होती. रविवार होता, त्यामुळे भरपूर लोक आले होते. तरीही एकदम ते सगळं चित्र धूसर होऊन समोरच्या पाषाणांतून, तिथल्या खांबांतून, कमानींतून, भिंतींतून जुना वैभवशाली काळ असा समोर येऊन ठाकलाय, असं काहीसं वाटायला लागलं. (फार सिनेमे बघितल्याचा परिणाम असावा.) खरं तर ते मंदिर खूप भव्य, प्रचंड मोठं किवा उत्तुंग असं काहीच नाही. एकच मजल्याएवढ्या उंचीचं सर्व काम. समोरच्या बाजूला एक गोपुर होतं, तेच काय तेवढं दोन-तीन मजल्यांएवढं उंच. बाकी सर्व बांधकाम साधारण दहा ते पंधरा मीटरपेक्षा उंच नसावं, तरीही त्या प्रांगणात फिरताना काही तरी भव्य-दिव्य असं आपण बघत आहोत, असं वाटत होतं. कर्नाटकात गेल्यावर तिथली लिपी आपल्याला येत नसल्याचा त्रास फार होतो. इथं विठ्ठल मंदिरातही त्या काळाशी जोडणारा लिपीसारखा एखादा धागा उणाच होता. त्याची काहीशी सलही वाटत होती. तिथल्या प्रत्येक खांबाने, त्या खांबावरच्या शिल्पाने, त्यातून न समजणाऱ्या एखाद्या आकृतीने आपल्याशी भरभरून बोलावं, असं फार वाटत होतं. मात्र, लिपी समजत नसल्यास वाचता न येण्यामुळं जी चीडचीड होते, तीच थोडीशी आधी इथं व्हायला लागली... पण काही क्षणच! नंतर ते भग्न सौंदर्य माझ्याशी लिपीपलीकडची भाषा बोलू लागलं. ती भाषा होती वास्तुशास्त्राची, प्रमाणबद्धतेची, सौष्ठवाची, कमालीच्या परिश्रमांची आणि शिल्पांतून आकार घेणाऱ्या अद्वितीय सौंदर्याची! मग माझं मन हळूहळू शांत व्हायला लागलं. आपोआप समोरचं लख्ख दिसू लागलं.
सर्वांचं लक्ष या मंदिरासमोर असलेल्या त्या सुप्रसिद्ध रथाकडं होतं. आम्हीही आधी तिथं धाव घेतली. आपल्याकडच्या पन्नासच्या नोटेवर या रथाचं चित्र छापलेलं आहे. त्यामुळं अनेक लोक हातात एक नोट घेऊन समोरच्या त्या रथाचा फोटो घेत होते. आम्ही गेलो तेव्हा स्वच्छ ऊन होतं. ती सर्व पाषाणवास्तू त्यामुळं झळाळून उठली होती. फोटो अप्रतिम येत होते. सोबतच्या पुस्तकात माहिती वाचून, आम्ही एकेक ठिकाण बघत होतो. मुख्य रथाचं वर्णन या पुस्तकातही सविस्तर दिलंं आहे. या रथासमोर दोन हत्ती आहेत. मात्र, ते नंतर तिथं आणून ठेवले असावेत. मूळ शिल्पात तिथं घोडे असावेत. त्या घोड्यांच्या शेपटीचा काही भाग मुख्य रथाला जोडलेला दिसतोही. शिवाय हत्ती त्या रथाच्या प्रमाणात मोठे नाहीत. प्रमाणबद्धता हे त्या शिल्पांचं वैशिष्ट्य असताना तिथं अशी चूक होणं शक्यच नाही. पण ते काही का असेना, सध्या ते दोन छोटेसे हत्तीच तो रथ ओढताहेत, असं दिसतं. रथाची चाकं आणि वरच्या बाजूची कलाकुसर केवळ अप्रतिम आहे. आम्ही सर्व बाजूंनी फिरून हा रथ पाहिला. भरपूर फोटो काढले. या रथासमोर मुख्य विठ्ठल मंदिर आहे. तिथे आता चौथऱ्यावर ‘रिस्टोरेशन’चे काम सुरू आहे. त्यामुळे तिथं एक सिक्युरिटी गार्ड बसला होता आणि तो कुणालाही वर येऊ देत नव्हता. या मुख्य मंदिराच्या मंडपात जे स्तंभ आहेत, त्यावर वाजवलं तर वेगवेगळे ध्वनी उमटत. आपल्या लोकांनी ते खांब वाजवून वाजवून, त्यावर जोराने आघात करून खराब करून टाकले आहेत, असं समजलं. त्यामुळंच आता तिथं वर चढायला बंदी आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्ती नाही. आपल्या पंढरपूरला असलेली विठ्ठलाची मूर्ती मुस्लिम आक्रमकांपासून वाचविण्यासाठी काही काळ इथं आणून ठेवली होती असं सांगतात. (किंवा उलटही असेल.) ‘कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू’  हे तिथून आलं असणार. महाराष्ट्र आणि कर्नाटकला घट्ट बांधून ठेवणारा हा विठ्ठल नावाचा धागा अतूट आहे, एवढं मात्र खरं. 
विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात आणखी तीन सभामंडप होते. तेही बघितले. प्रत्येक ठिकाणी सेल्फीबाजांची गर्दी होती. आम्हीही जवळपास तेच करत होतो. इथल्या मंडपांत व्यालप्रतिमा बऱ्याच दिसतात. व्याल म्हणजे एक काल्पनिक प्राणी. त्याचं धड एका प्राण्याचं आणि शिर एका प्राण्याचं, कान किंवा शेपटी आणखीन तिसऱ्याच प्राण्याची असते. अशा व्यालांच्या बऱ्याच प्रतिमा तिथं आहेत. मुख्य सभामंडपात जाता येत नसलं, तरी मागच्या बाजूनं गाभाऱ्याच्या पुढच्या बाजूला जाता येतं. आम्ही तिकडं वळलो. तिथं एक चाफ्याचं सुरेख झाड होतं. तिथं बऱ्याच जणांचं फोटोसेशन सुरू होतं. तिथला एक गाइड हिंदीत त्याच्याबरोबरच्या लोकांना ‘सोनाली कुलकर्णीसोबत मी हंपी नावाच्या मराठी सिनेमात काम केलंय,’ असं सांगत होता. मलाही २०१७ चा प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘हंपी’ सिनेमा आठवला. त्यात (धाकट्या) सोनालीसह ललित प्रभाकरनं सुंदर काम केलंय. मी ब्लॉगवर तेव्हा त्याचं परीक्षणही लिहिलं होतं. ‘डोण्ट वरी, बी हंपी’ असं त्याचं शीर्षक होतं. त्यात प्रियदर्शन जाधवनं साकारलेला गाइड कम रिक्षावाला असं म्हणत असतो. माझ्याही ते बरेच दिवस डोक्यात राहिलं होतं. त्या गाइडच्या बोलण्यामुळं एवढं सगळं आठवलं. (परत आल्यावर आवर्जून ‘हंपी’ पुन्हा बघितला. त्यात ‘हंपी’ अप्रतिम टिपलंय यात वाद नाही.)
असो.
आम्ही मागच्या बाजूनं त्या गाभाऱ्याच्या पुढं असलेल्या भागात गेलो. थोडं खाली उतरून गर्भगृहाला प्रदक्षिणाही घालता येत होती. आत अंधार होता. अनेकांनी मोबाइलचे फ्लॅशलाइट सुरू केले होते. या प्रदक्षिणा मार्गावर हत्ती आणि घोड्याची व्याल टाइप प्रतिमा असल्याचा उल्लेख आशुतोष बापट यांच्या पुस्तकात होता. मी ती प्रतिमा शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मला काही ती दिसली नाही. प्रदक्षिणा मार्गावरून बाहेर आलो. इतर सभामंडप बघितले. सर्वत्र किती फोटो काढू आणि किती नको, असं होत होतं. शेवटी अगदी थकायला झालं. तिथंच एका सभामंडपात आम्ही टेकलो. रविवारमुळं गर्दीचे लोंढेच्या लोंढे येत होते. आम्हाला अजून बरंच काही बघायचं होतं. मग आम्ही बाहेर पडलो. परत जाण्यासाठीही त्या बॅटरी गाड्यांसाठी मोठी रांग होती. अखेर साधारण अर्ध्या तासानं आमचा नंबर लागला आणि आम्ही मुख्य गेटकडं परतलो. मंजूबाबाला फोन केला. तो लगेच आला. आता आम्हाला भूक लागली होती. मग तो आम्हाला कमलापुरात एक ‘काली रेस्टॉरंट’ नावाचं हॉटेल होतं, तिथं घेऊन गेला. हे पहिल्या मजल्यावर होतं आणि तिथंही भरपूर गर्दी होती. दोनशे रुपये असा एकच दर होता आणि ‘अनलिमिटेड बुफे’ होतं. मग आम्ही पैसे देऊन कुपन घेतलं आणि केळीचं पान असलेली ताटं धरली. भूक लागली होती कडाडून, त्यामुळं ती केळीची भाजी, रस्सम, नंतर भात-आमटी असं सगळं भरपूर हाणलं. इथला पापड मस्त होता. त्यामुळं जो तो तो पापड मागत होता आणि ते पटापट संपत होते. टेबलांवर जागा नव्हती. कुणीही कुठंही बसत होतं. आम्हाला ते जरा अवघडच गेलं, पण भुकेपुढं काय होय! शेवटी ‘उदरभरण’ झालं आणि आम्ही पुढं निघालो. आता आम्हाला मंजूबाबा ‘क्वीन्स बाथ’, कमलमहल आणि गजशाला हे तीन स्पॉट दाखवायला घेऊन गेला. ‘रानी का स्नानगृह’ असो, की कमल महल... तिथल्या राण्याच हे स्नानगृह किंवा तो महाल वापरत होत्या की अन्य कारणांसाठी त्यांचा वापर केला जात होता, याविषयी ठोस माहिती नाही, असं तिथल्या फलकांवर स्पष्टपणे नमूद केलं होतं. अर्थात जे सर्वमान्य नाव आहे, तेच तिथंही लिहिलं होतं. त्या स्नानगृहात पाणी सोडण्याची यंत्रणा मात्र भन्नाट होती. दगडी पाटांतून पाणी खेळवलं होतं. अर्थात सध्या ते पूर्ण कोरडं होतं. इथल्या वास्तुरचनेवर इस्लामिक प्रभावही आहे. त्यामुळं हे काम नक्की विजयनगरच्या काळात झालं असावं, की नंतर त्यात मॉडिफिकेशन झालं असावं, असा प्रश्न आहे. नंतर आम्ही कमलमहाल बघायला गेलो. इथं आत जाऊ देत नाहीत. मात्र, बाहेरूनच तो महाल अप्रतिम सुंदर दिसतो. तो अजूनही चांगला राहिला आहे, हे महत्त्वाचं. इथंच ‘हंपी’तलं सोनालीचं नृत्य चित्रित करण्यात आलं आहे. हा महाल आकाशातून कमळाच्या पाकळ्यांसारखा दिसतो म्हणे. (आम्ही अनेक ठिकाणी या वास्तूंचं ड्रोनद्वारे चित्रीकरण सुरू असल्याचं नंतर पाहिलं.)
इथून पुढं आम्ही गजशाळा बघायला गेलो. कमलमहालाच्या शेजारीच ही वास्तू आहे. सलग आडव्या बांधलेल्या या इमारतीत अकरा कमानी आहेत. प्रत्येक कमानीत एकेक हत्ती मावू शकेल, अशी जागा आहे. मागल्या बाजूने माहुताला ये-जा करण्यासाठी छोटा दरवाजा आहे. शेजारीच आणखी एक इमारत आहे. ती सुरक्षारक्षकांची असावी, असा अंदाज आहे. काटकोनात असलेल्या या दोन इमारतींच्या समोर सुंदर हिरवळ होती. आम्ही तिथं जरा टेकलो. मी तर आडवाच झालो. फार बरं वाटत होतं. बरीच पायपीट झाली होती. पण आता संध्याकाळ होत आली होती. त्यामुळं हवाही आल्हाददायक होत चालली होती. इथून आम्ही ‘महानवमी डिब्बा’ (खरं तर ते तिब्बा असावं...) बघायला गेलो. हे एक भव्य प्रांगण आहे. इथं समोर एक उंच मंचासारखा चौथरा आहे. इथं राजे-रजवाडे मंडळी बसून समोर सांस्कृतिक कार्यक्रम बघत असायची म्हणे. समोर मात्र सर्वत्र सपाट नव्हतं. एके काळी खोलगट आखाड्यासारखं काही तरी होतं. तिथं प्राण्यांच्या झुंजी चालत असतील का, असा विचार आला. समोर एके ठिकाणी तळघर होतं. तिथंही आम्ही आत फिरून आलो. खजिना ठेवायची जागा असणार, असं वाटलं. त्या जागेच्या शेजारी एक अतिशय सुंदर दगडी बारव आहे. हिचं उत्खनन अगदी अलीकडे,म्हणजे १९८८ मध्ये झालंय. त्यामुळंच ती खूपच चांगल्या स्थितीत दिसली. 

इथून पुढं आम्हाला खरं तर हजारीराम आणि भूमिगत शिवमंदिरही बघायचं होतं. मात्र, विरुपाक्ष मंदिर हे मुख्य आकर्षण सूर्यास्ताच्या आत बघायला हवं होतं. त्यामुळं मंजूबाबानं आमचा कार्यक्रम बदलून ही दोन ठिकाणं उद्या करू या असं सांगितलं आणि रिक्षा विरुपाक्ष मंदिराकडं घेतली. हंपीचा तो प्रसिद्ध चढ चढून आल्यावर त्यानं आधी डावीकडं रिक्षा घेतली. इथंच ती लक्ष्मी-नृसिंहाची भव्य मूर्ती आहे. आम्ही उतरलो. त्या मूर्तीसमोर बऱ्यापैकी गर्दी होती. या मूर्तीच्या मांडीवर लक्ष्मीची मूर्ती होती. मात्र, ती आक्रमकांनी तोडली. आता केवळ नरसिंह आहे. त्याच्या पायाला आता ‘योगपट्ट’ बांधला आहे. या नरसिंहाचे सुळे, डोळे एवढे हुबेहूब आहेत, की ते बघताना जरा भीतीच वाटते. म्हणून याला ‘उग्र नरसिंह’ असेही म्हणतात. याच्या शेजारी ‘बडीव लिंग’ आहे. एकच अखंड शिळेतून कोरलेलं हे भव्य शिवलिंग असून, भोवती पाणी आहे. नरसिंह आणि हे शिवलिंग या दोन्ही ठिकाणी समोर ग्रिलचे दरवाजे लावून जवळ जाण्यास बंदी करण्यात आली आहे. एका अर्थाने ते योग्यच आहे. याचे कारण आपल्याकडच्या पर्यटकांना कसलंही भान नसतं. फोटो काढण्याच्या नादात आपण त्या मूर्तीची झीज करतो आहोत, हेही अनेकांच्या लक्षात येत नाही. असो. आता आम्हाला मुख्य विरुपाक्ष मंदिरात जायचं होतं. पुन्हा एकदा तो चढ चढून गेल्यावर एकदम विरुपाक्ष मंदिराचं उंच गोपुर दिसलं. सभोवती भरपूर मोकळी जागा, पार्किंगसाठीची जागा अनेक गाड्यांनी व्यापलेली, शेजारी छोटे विक्रेते, पलीकडे तर एक लहानसा बाजारच, मंदिरासमोर मोठा रस्ता हे सर्व वातावरण त्या ठिकाणाचं स्थानमाहात्म्य दाखवीत होतं. एका अर्थानं हे त्या सर्व परिसराचं ‘राजधानी स्थळ’ होतं म्हणायला हरकत नाही. आता उन्हं अगदी कलायला आली होती. मंदिराच्या दारात, पण थोडंसं दूर मंजूनं आम्हाला सोडलं. तिथून आम्ही त्या भव्य गोपुराकडं बघत चालत निघालो. आत पोचल्यावर पुन्हा एक भव्य प्रांगण होतं. तिथं अनेक भाविकांची वर्दळ होती. आम्हीही फोटो काढले. इथं मात्र गाइड घ्यावा, असं वाटू लागलं. समोरच एक जण आला. त्याच्यासोबत असलेल्या लोकांना ‘बाय’ करतच होता, तेव्हाच आम्ही त्याला विचारलं. ‘श्रीनिवास’ असं त्याचं नाव होतं. पाचशे रुपयांत यायला तो तयार झाला. एका अर्थानं आम्ही गाइड घेतला, ते बरंच झालं. कारण त्यानं आम्हाला भरपूर आणि चांगली माहिती दिली. 
मंदिराच्या समोर असलेल्या गोपुरापासून ते इथल्या विरुपाक्षाच्या मूर्तीपर्यंत सर्व माहिती श्रीनिवासने अत्यंत तन्मयतेनं दिली. त्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा होती. मंदिराच्या आत आणखी एक लहान प्रांगण होतं. तिथं ते पाच स्तंभ होते आणि सभोवती स्थानिक महिला नटून-थटून, साडीत, गजरे माळून आल्या होत्या आणि सुंदर रांगोळ्या रेखाटून तिथं दिव्यांची आरास मांडत होत्या. आम्ही फारच भाग्यवान होतो. तिथं शेजारीच मंदिरातील प्रसिद्ध हत्तीण लक्ष्मी दिसली. तिला सोंडेत पैसे दिले की ती सोंड डोक्यावर ठेवून आशीर्वाद देते. आमच्यापैकी वृषालीला ते करायचा भलताच उत्साह होता. मात्र, सुरुवातीला तिथं मुलांची गर्दी होती. त्यामुळं आपण मंदिर पाहून आल्यावर ‘लक्ष्मी’कडे जाऊ या, असं श्रीनिवास म्हणाला. आम्ही श्रीनिवाससोबत ते मंदिर फिरून पाहिलं. विरुपाक्षाची भव्य मूर्ती, मागच्या बाजूला असलेल्या पंपादेवी, भुवनेश्वरीदेवी यांच्या मूर्ती हे सगळं बघितलं. पंपादेवी म्हणजेच पार्वती. मग गाइडनं ती रती व मदनाची (मन्मथ) कथा पुन्हा सांगितली. विरुपाक्ष इथे कसे आले, हे सांगितलं. आपल्या प्रत्येक मंदिराला, प्रत्येक ऐतिहासिक स्थळाला हे असं लोककथांचं, पुराणकथांचं सुंदर कोंदण असतंच. त्या भागातल्या सर्व लोकांची या कथांवर नितांत श्रद्धाही असते. प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधणाऱ्या मंडळींना या मंडळींच्या श्रद्धेमागचा भाव कळणं कठीण आहे. मला स्वत:ला त्या कथांपेक्षाही ती सांगणाऱ्या माणसाच्या नजरेतला श्रद्धाभाव आवडतो. त्या भावनेचा आदर करावासा वाटतो. 

नंतर श्रीनिवासनंं आम्हाला मंदिराच्या मागं नेऊन ते ‘पिन होल कॅमेरा’ तंत्रानं इथल्या गोपुराची आत कशी सावली पडते, ते दाखवलं. तेव्हाच्या वास्तुशास्त्रातील प्रगती बघून आपण केवळ थक्क होतो. नंतर तो आम्हाला मंदिराच्या उत्तर दिशेच्या दरवाजातून बाहेर घेऊन गेला. इथं शेजारी बारवेच्या आकाराचं चांगलं बांधलेलं तळं आहे. तुंगभद्रा नदीतील पाणी या तळ्यात आणण्याची सोय केलेली आहे. तिथंही अनेक लहान-मोठी देवळं होती. पुन्हा आत आलो, तो एका ताईंनी येऊन सर्वांना हातावर दहीभाताचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. आणखी एक बाई आल्या आणि त्यांनी लेमन राइसचा प्रसाद दिला. त्या वेळी भूक लागलेली असताना केवळ दोनच घासांचा तो प्रसाद इतका सुंदर लागला म्हणून सांगू! आम्ही तसं त्यांना सांगितल्यावर त्या पण अशा काही खूश झाल्या, की बस्स! श्रीनिवास आता आम्हाला बाहेरच्या प्रांगणात घेऊन गेला. इथं आता लक्ष्मी हत्तिणीचं दर्शन घ्यायचं होतं. वृषालीनं एक नोट तिच्या सोंडेत दिली आणि श्रीनिवासनं सांगितल्याप्रमाणे ती पटकन तिच्याकडं पाठ करून वळली. त्याबरोबर ‘लक्ष्मी’नं सराईतासारखी तिच्या डोक्यावर सोंड ठेवून तिला आशीर्वाद दिला. ही हत्तीण या कामात चांगलीच प्रशिक्षित करण्यात आली आहे. पैसे दिले तरच ती सोंड डोक्यावर ठेवते. बाकी केळी किंवा अन्य काही दिलं तर नुसतंच खाते. एकूण मजेशीर प्रकार होता. बाहेर आल्यावर तिथल्या तीन तोंडांच्या नंदीचेही आम्ही फोटो काढले. त्याचीही काही तरी कथा होतीच. मी आता विसरलो. नंतर एकदम बाहेरच्या प्रांगणात आलो. तिथं अनेक लोक पथारी टाकून झोपायच्या तयारीत आलेले दिसले. श्रीनिवासनं सांगितलं, की या प्रांगणात लोक राहायला येतात. पहाटे नदीत स्नान करतात आणि ओलेत्याने विरुपाक्षाचे दर्शन घेऊन आपापल्या घरी जातात. शिवाय या प्रांगणात अनेक लग्नेही होतात. इथं श्रीनिवासनं आमच्या मोबाइल कॅमेऱ्यातील एका सुविधेचा फायदा घेऊन धनश्रीचा व माझा असा फोटो काढला, की माझ्या दोन्ही बाजूंनी ती उभी राहिलेली दिसेल. साई व वृषालीचा तसाच फोटो काढला. आम्ही खूप हसलो. एकूण श्रीनिवास हा फारच पटाईत आणि उत्तम गाइड होता, यात काही शंका उरली नाही. आम्ही आनंदानं त्याला पाचशे रुपये दिले व विरुपाक्षाला पुन्हा एक नमस्कार करून बाहेर पडलो. आम्ही फारच चांगल्या दिवशी आलो होतो. समोर त्रिपुरारी पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आकाशात लखलखत होता. खाली त्या गोपुरावरचा पिवळाधम्मक दिवाही तसाच दीप्तीमान होऊन झळकत होता. वातावरणात सुखद गारवा होता. आमच्या दिवसभराच्या सर्व श्रमांचा परिहार झाला होता. तिथं शेजारी छोटं मार्केट होतं. तिथं चक्कर मारली. चहा घेतला. मंजूबाबानं आता आम्हाला हॉटेलवर सोडलं तेव्हा सात वाजत आले होते...
हंपीतला पहिला दिवस विठ्ठल ते विरुपाक्ष असा संस्मरणीय झाला होता. ‘पाषाणांतले देव’ आम्हाला पावले होते...  तिकडं त्रिपुरी पौर्णिमेच्या प्रकाशात ती मंदिरं न्हाऊन निघाली होती आणि त्यांच्या दर्शनानं इकडं आमची मनंही!

(क्रमश:)

----
पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

------


30 Nov 2023

हंपी डायरी - भाग १

पाषाणशिल्पांच्या दुनियेत...
----------------------------------


हंपीला जायचं माझं स्वप्न अखेर पूर्ण झालं. साधारण २०१९ मध्ये आपल्याकडचे अनेक जण हंपीला जाऊन तिथले फोटो टाकताना पाहिले, तेव्हा मी फेसबुकवर ‘मी हंपीला अजून गेलेलो नाही, हा समाज मला माफ करणार का?’ अशा आशयाची पोस्टही टाकल्याचं आठवतं. त्यानंतरची दोन-तीन वर्षं ‘कोव्हिड’मध्येच गेली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हंपीला जायचं नक्की झालं. मी, धनश्री आणि सोबत माझा धाकटा आतेभाऊ साईनाथ व त्याची पत्नी वृषाली असणार होती. अगदी तिकडचं बुकिंगही झालं. मात्र, तेव्हा बेळगावला सीमाप्रश्न पेटल्यानं वातावरण बिघडलं. आम्हाला आमची कार घेऊन जायचं असल्यानं आम्ही जरा घाबरून तिकडं जायचं रद्दच करून टाकलं आणि बरोबर उलट्या दिशेला म्हणजे, दमणला जाऊन आलो. मात्र, तेव्हाच पुढच्या वर्षी हंपी नक्की करायचं, हे ठरवून टाकलं. यंदा भावानं नवी नेक्सॉन कारही घेतली होती. त्यामुळं जाताना त्या कारनंच जायचं हेही आम्ही पक्कं ठरवलं होतं. त्यानुसार २५ ते २८ नोव्हेंबर असे चार दिवस ही ट्रिप केली. ट्रिप खूप छान झाली. मजा आली. हंपीत दोन दिवस कमीच पडले, असं वाटलं. शिवाय आम्हाला वेळेअभावी बदामी व पट्टदकल वगैरे काही बघता आलं नाही. त्यासाठी हंपीची आणखी एक ट्रिप नक्की करणार!
आम्ही शनिवारी सकाळी साडेसहा वाजता पुण्याहून निघालो. आम्हाला ‘गुगल मॅप’वर सोलापूर, विजापूर (आता विजयपुरा) मार्गे रस्ता सुचवण्यात आला होता. मात्र, बेळगाववरूनच जायचं हे आम्ही ठरवलं होतं. मी बेळगावला शेवटचा १९९९ मध्ये साहित्य संमेलनाच्या कव्हरेजसाठी गेलो होतो. त्यानंतर अगदी याच वर्षी एप्रिलमध्ये गोव्याहून ट्रेननं येताना संध्याकाळी थोडा वेळ ट्रेनच्या दारातून बेळगावचं ओझरतं दर्शन झालं होतं. यंदाही आम्ही बेळगावात थांबणार नव्हतोच; पण तरी जाताना बेळगाव, हुबळी-धारवाडवरूनच जायचं हे आम्ही ठरवलं होतं. सकाळी दहा वाजता कऱ्हाडला पोचलो. ‘संगम’ला ब्रेकफास्ट केला. कऱ्हाडमध्ये उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. त्यामुळं तिथं सध्या ट्रॅफिक जॅम होत असतो. मात्र, आम्ही सुदैवानं न अडकता बाहेर पडलो. कोल्हापूर, कागल ओलांडून आम्ही बाराच्या आसपास कर्नाटकात प्रवेश केला. कोगनोळी नाका ही दोन्ही राज्यांची सीमा. (खरं तर बेळगाव, निपाणी, संकेश्वर ही सगळी गावं आपलीच. त्यामुळं ही सीमा असं म्हणवत नाही. पण असो.) साधारण दीडच्या सुमारास आम्ही बेळगावात पोचलो. त्याआधी वंटमुरी हे गाव लागलं. मला एकदम ‘वंटमुरीकर देसाई त्यांचा बोका’ आठवून हसायला आलं. बेळगावचं सगळं असोसिएशन ‘लंपन’मुळं आहे. इंदिरा संत हे आणखी एक कारण. शिवाय पुलंचे ‘रावसाहेब’ आहेतच. बेळगावात पोचताना आम्ही ‘रावसाहेब’ ऐकणार नाही, हे शक्यच नव्हतं. मनसोक्त हसतच आम्ही बेळगावात प्रवेश केला. खरं तर बायपासवरून आम्ही पुढं गेलो. हल्ली सर्व महामार्गांवर बायपास झाले आहेत. ते गर्दी टाळण्याच्या दृष्टीनं सोयीचे असले, तरी त्यामुळं त्या त्या गावाचा फील घेता येत नाही. आमचंही तेच झालं. या वेळी बेळगावमध्ये कर्नाटक सरकारनं बांधलेलं उंच टेकाडावरचं ते विधान सौध मात्र बघता आलं. मराठी लोकांच्या नाकावर टिच्चून बांधलेलं असलं तरी आहे मात्र भव्य व देखणं! असो.
बेळगाव ओलांडलं. या भागात रस्त्याने मी प्रथमच जात होतो. हुबळी-धारवाडकडे निघालो होतो. हा एके काळी सगळा मुंबई इलाख्यातला भाग. तिकडं अजूनही याला ‘बॉम्बे कर्नाटक’ असंच म्हणतात. खरं तर माझं कुणीही नातेवाइक तिकडं नाही, ना माझा कुठला सांस्कृतिक-भावनिक धागा तिकडं जोडलेला आहे! पण का कोण जाणे, या भागाविषयी आपुलकी वाटते. आम्ही थोडं पुढं गेल्यावर रस्त्यातच एका हॉटेलमध्ये जेवलो. साधंसं हॉटेल, पण स्वच्छ. जेवणही चांगलं होतं. भूक लागलीच होती. जेवून पुढं निघाल्यावर आता गाडी मी चालवायला घेतली. सकाळपासून साईनाथच ड्राइव्ह करत होता. आता त्याला जरा विश्रांती द्यायला हवी होती. आता आम्ही पुढं धारवाडकडं निघालो. या सगळ्या परिसराविषयी कितीदा काय काय वाचलेलं... धारवाडविषयीची आपुलकी जी. ए. कुलकर्णींमुळं असणार. बाकी पुलंच्या लेखनात इकडचे बरेच उल्लेख येतात. मग ते मल्लिकार्जुन मन्सूर असतील, भीमसेन जोशी असतील, गंगूबाई हनगल असतील... ही सर्व मंडळी याच भागातील. उत्तर कर्नाटक हा नैसर्गिकरीत्या तसा दुष्काळी भाग. मात्र, गुणवान कलाकार मंडळींचीही खाणच. धारवाड आधी लागलं. पण पुन्हा तेच. बायपासनं पुढं निघालो. गावाचा फील नाहीच लाभला. डावीकडं लांबवर दिसणाऱ्या त्या छोटेखानी शहराकडं बघत, मनातल्या मनात जीएंच्या स्मृतींना वंदन केलं. त्यात मी अलीकडं गिरीश कार्नाडांचं आत्मचरित्र वाचलं, त्यात धारवाडच्या फार सुंदर आठवणी त्यांनी लिहिल्या आहेत. सारस्वतांच्या त्या कॉलनीचं ते टेकाड बघायची फार इच्छा होती, पण नाइलाज होता. धारवाड ते हुबळी हा रस्ता अजूनही दोन लेनचाच आहे. आता तो चौपदरी करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळं तिथं सतत कोंडी होत होती. आम्ही थोड्याच वेळात हुबळीला पोचलो. धारवाड-हुबळी ही तशी जोड-शहरंच. आपल्या पुणे व पिंपरी-चिंचवडसारखी. ही उत्तर कर्नाटकातील प्रमुख सांस्कृतिक केंद्रं. मला एकदा तिथं नीट राहून, शांतपणे चालत हिंडून ती गावं बघायची आहेत. पण या वेळेला निदान त्या गावांवरून जाता आलं, हेही नसे थोडके. हुबळी शहर डावीकडं ठेवून आम्ही पुढं निघालो. इथं आपण पुणे-बेंगळुरू महामार्ग सोडतो आणि डावीकडे गदग, कोप्पलकडे वळतो. हाच रस्ता पुढं होस्पेट, रायचूरकडे जातो. (पुढं आंध्रात...) इथं आमची थोडी गडबड झाली. आम्ही थोडं पुढं गेलो. मात्र, लगेच रस्ता सापडला आणि वळून आम्ही योग्य मार्गाला लागलो. हा रस्ता आता सिमेंटचा आणि चार पदरी, सुंदर झाला आहे. कर्नाटकातले बहुतेक महामार्ग, मोठे रस्ते आता चांगले, प्रशस्त आहेत. आम्ही थोड्याच वेळात गदगला पोचलो. इथेच भीमसेन जोशी जन्मले. गाव डावीकडे आणि आम्ही बायपासवरून पुढे. पुन्हा एकदा मनातल्या मनातच अण्णांच्या स्मृतींना वंदन केलं.
आता संध्याकाळ व्हायला लागली होती. आम्ही सकाळपासून प्रवास करत होतो. कोप्पल ओलांडलं. खरं तर मी हंपीला निघालोय म्हटल्यावर आमचे मित्रवर्य किरण यज्ञोपवीत यांचा फोन आलाच होता. मागच्या वर्षीही आम्ही निघणार म्हटल्यावर किरणनं बऱ्याच टिप्स दिल्या होत्या. आताही त्यानं फोन करून कोप्पलला चांगली मंदिरं आहेत अशी माहिती दिली. मात्र, आमच्या वेळेत ते बसणार नव्हतं. कोप्पल सोडून आम्ही पुढं निघालो.आता होस्पेट जवळ आलं होतं. मात्र, पाच वाजल्यामुळं चहाचा ब्रेक गरजेचा होता. एक टपरी बघून थांबलो. तिथं एक जोडपं ते छोटेखानी हॉटेल चालवत होतं. त्यातल्या बाईला हिंदी कळत नव्हतं. मात्र, ती सफाईदार इंग्लिश बोलत होती. तिनं आम्हाला तिथली स्पेशालिटी असलेली ढोबळी मिरची घातलेली मसाला भजी घेण्याचा आग्रह केला. आम्ही एक प्लेट घेतली. ती गरमागरम आणि तिखट भजी भलतीच चवीष्ट, झणझणीत होती. मजा आली. नंतर मोठा कप भरून चहा घेणं आवश्यकच होतं. तिथून निघालो. पुढं एक फ्लायओव्हर लागला. डावीकडं जाणारा रस्ता विजापूरकडून येत असावा, असं मी साईनाथला म्हटलं. (नंतर परतीच्या प्रवासात माझा अंदाज बरोबर ठरला.) तिथं एक टोलनाका होता. तो पार केल्यावर होस्पेट आलंच. तोवर अंधार पडला होता. होस्पेट हे एक मध्यम आकाराचं शहर असल्याचं दिसलं. साधारण आपल्याकडच्या साताऱ्यासारखं! गुगल मॅप लावून दहा मिनिटांत आमचं हॉटेल शोधलं. हे हॉटेल साईनाथनं बुक केलं होतं. ते कसं असेल याची धाकधूक होती. मात्र, गावाच्या मध्यवर्ती रस्त्यावर आणि चार-पाच मजली हे प्रशस्त हॉटेल, खाली गजबजलेलं रेस्टॉरंट, पार्किंगमधल्या कारची विपुल संख्या (त्यात भरपूर ‘एमएच-१२’ होत्या, हे सांगणे न लगे...) बघून ‘हुश्श’ वाटलं. एखाद्या गावातलं, जुनं, प्रतिष्ठित असं एखादं हॉटेल असतं, तसं हे ‘प्रियदर्शिनी पार्क’ वाटलं. रिसेप्शनला बुकिंग दाखवून लगेच रूम ताब्यात घेतल्या. अत्याधुनिक सोयी असलेल्या, स्वच्छ रूम बघूनच फार बरं वाटलं. चौथ्या मजल्यावरच्या आमच्या रूमला गावाच्या दिशेनं उघडणारी बाल्कनी होती. तिथून सर्व शहराचा नजारा छान दिसत होता. लांबवर छोटेखानी टेकड्या दिसत होत्या. तेच हंपी असावं, असं मनातल्या मनात नोंदवून ठेवलं.
मागच्या वर्षी आमचं हंपीला जायचं ठरलं, तेव्हा गौरी लागूंच्या कन्येनं - मेघानं - मला तिथल्या मंजू नावाच्या गाइडचा नंबर दिला होता. तो माझ्याकडं होता. किरणनं आमच्यासाठी ज्या गाइडला फोन केला होता, तो बिझी होता. मग आमचं रात्रीचं जेवण झाल्यावर मी या मंजूला फोन केला. सुदैवानं तो दुसऱ्या दिवशी उपलब्ध होता. ‘आपण गाइड नसून, रिक्षाची सेवा देतो,’ हेही त्यानं प्रामाणिकपणे सांगितलं. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता भेटायचं ठरवलं. तो आमच्या हॉटेलवर येणार होता. आम्हीही दिवसभराच्या प्रवासानं दमलो होतोच.

विजयनगरच्या साम्राज्यात...

सकाळी आवरून खाली असलेल्या ‘नैवेद्यम्’ या आमच्या हॉटेलच्याच रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्टला गेलो. रविवार असल्यानं भरपूर गर्दी होती. निम्मे-अर्धे लोक मराठी होते. पहिल्या दिवशी टिपिकल इडली-वडा, उत्तप्पा, डोसा असा ठरलेला नाश्ता झाला. साडेसाठ वाजता मंजूबाबा आला. त्याच्याशी डील केलं. दोन दिवसांचे चौघांना रिक्षाने फिरवण्याचे पाच हजार रुपये ठरले. आम्ही लगेच बाहेर पडलो. त्यानं आधी कमलापूर गाव ओलांडून अनेगुंदीच्या दिशेनं नेलं. जाताना उजव्या बाजूला कमलापूरचा सुंदर, मोठा तलाव दिसतो. डावीकडं थोडं खालच्या बाजूला केळीची शेती, नारळाची झाडं असं सुंदर दृश्य दिसतं. मंजू आम्हाला कमलापूरच्याही पुढं घेऊन गेला. तिथं माल्यवंत रघुनाथाचं मंदिर आहे. ते आधी पाहिलं. पहिल्याच मंदिराच्या दर्शनानं आम्ही अवाक झालो. छोट्याशा टेकडीवर असलेल्या त्या परिसरात सर्वत्र प्रचंड मोठ्या शिळा पडल्या होत्या. त्यातले काही महापाषाण तर कधीही पडतील, अशा बेतात एकमेकांवर रेलून बसले होते. गुरुत्वाकर्षणाला पराजित करणारं असं कोणतं आकर्षण त्या शिळांना एकमेकांशी धरून ठेवत असेल, असं वाटून फारच आश्चर्यचकित व्हायला झालं. त्या मंदिराच्या शेजारी असलेल्या एका मंडपात नाच-गाण्याचे कार्यक्रम व्हायचे. तिथल्या खांबा-खांबांवर नृत्याच्या विविध पोझेस असलेल्या शिल्पाकृती कोरलेल्या होत्या. सध्या इथं अगदी मोठा समारंभ न परवडणाऱ्या लोकांचे विवाह समारंभही होतात, अशी माहिती मंजूबाबानं दिली. नंतर तो आम्हाला मंदिराच्या मागच्या बाजूला घेऊन गेला. तिथं एक प्रचंड पाषाण आडवा पडला होता. आम्ही तिथं भरपूर फोटो काढले. ‘या ठिकाणी मी फक्त माझे ग्राहकच घेऊन येतो,’ असं मंजूबाबा अभिमानानं सांगत होता. त्या परिसरात पडलेल्या प्रचंड शिळा, त्यांचे वेगवेगळे आकार पाहून आपण वेगळ्याच दुनियेत आल्याचा भास होत होता. 

विजयनगरचं साम्राज्य आणि हंपीतलं त्यांचं वैभव याविषयी भरपूर लिहिलं, बोललं गेलं आहे. ते आपल्यापैकी बहुतेकांना ठाऊक आहे. मलाही ही सगळी ऐकीव माहिती होती. मात्र, प्रत्यक्ष तिथं जाऊन हे सगळं अनुभवणं ही फारच निराळी गोष्ट होती. त्या हवेचा परिमळ, तिथल्या पाषाणाचा थंडगार स्पर्श, तिथल्या पाण्याची चव आणि तिथल्या आसमंतात ऐकू येत असलेल्या कित्येक थक्क करणाऱ्या लोककथा, दंतकथा यांच्या अजब मिश्रणातून जे अनुभवायला येतं, ते हंपी विलक्षण आहे. माल्यवंत रघुनाथाच्या मंदिरातून पूजापाठाचा घोष ऐकू येत होता. मंजूबाबानं सांगितलं, की १७-१८ वर्षांपासून काही साधूमंडळी इथं अखंड पूजापाठ करत आहेत. अजूनही त्यांचा तो कार्यक्रम संपलेला नाही. आपण सहस्रावर्तन करतो किंवा हरिनाम सप्ताहात जशी ती वीणा खाली न ठेवता अखंड वाजविली जाते, तसंच इथं काही साधू आलटून-पालटून हे मंत्रघोष सतत करत असतात. त्या तिथे जाण्यापूर्वी वर आणखी एक शिवाचं छोटंसं मंदिर होतं. तिथला तरुण पुजारी मला दोन-दोनदा हाक मारून बोलवत होता. कुणी तरी खेचून नेल्याप्रमाणं मी एकटाच तिथं गेलो. आपल्या शंकर या देवाला असंच कुठं कुठं उंचावर, कडेकपाऱ्यांत, दरीखोऱ्यात राहायला फार आवडतं. मला शान्ताबाईंचं ‘भस्मविलेपित रूप साजिरे’ हे अप्रतिम गाणं आठवायला लागलं. मी त्या छोटेखानी मंदिरात गेलो. त्या तरुण पुजारी पोरानं माझ्या हातून अभिषेक करविला, कपाळी भस्म लावलं. मीही मंत्रभारित झाल्यागत सगळं आपोआप केलं. पूजा झाल्यावर भानावर आलो. पुजारी मुलगा मोठ्या अपेक्षेनं पाहत होता. मलाही ते लक्षात आलं. मी अगदी सहज ‘जी-पे’ आहे का विचारलं. खरं तर तिथं जी-पेचा स्कॅनर होताही; पण तो बंद होता. त्यामुळं मी रोख पैसेच दक्षिणा म्हणून द्यावेत असं त्याचं म्हणणं पडलं. हल्ली माझ्या खिशात फार रोकड नसते. लागत नाही. खिशात एक पन्नासची नोट होती. बाकी पाचशेच्या होत्या. त्यामुळं नाइलाजानं मला शंभर रुपये द्यायचे असूनही मी ते पन्नास रुपये त्याच्या हातावर टेकवले आणि निघालो. तरुण पुजारी मुलगा तेवढ्यावरही समाधानी दिसला. ‘आम्हाला दुसरं उत्पन्नाचं साधन नाही, लोक जे देतील ते’ असं काहीसं तो पुटपुटत होता. मला तेव्हा नक्की काय वाटलं ते सांगता येत नाही. मात्र, आपण निदान शंभर रुपये द्यायला हवे होते, असं वाटून गेलं. (हा असा अनुभव हंपीत एकदाच आला. पहिला आणि शेवटचा.)
धनश्री, साईनाथ व वृषाली केव्हाच खालच्या रघुनाथ मंदिरात गेले होते. मी जरा गडबडीतच ते टेकाड उतरून त्या मंदिरात गेलो. तिथंही शेजारी एक लक्ष्मीचं मंदिर होतं. तिथलाही पुजारी बोलवत होता. मात्र, आता मी तिकडं दुर्लक्ष करून मुख्य मंदिरात शिरलो. हे चांगलं, जितंजागतं, नांदतं मंदिर होतं. इथंच त्या सभामंडपात ते दोन साधू पूजापाठ करत होते. मी आपला तिथं जाऊन एक नमस्कार ठोकला. मला त्या बाबानं हातावर तीर्थ दिलं. ताटलीतल्या दक्षिणेच्या पैशांकडं हात दाखवला. मात्र, तो तोंडानं मंत्रजप करत असल्याचा फायदा घेऊन मी पुन्हा एक नमस्कार ठोकला आणि तिथून निघालो. या तिघांनीही तिथं पैसे आधीच दिले होते. बाहेर येऊन फोटो काढले. मंदिराच्या बाहेर दोन कार लागल्या होत्या. त्यातली एक महाराष्ट्रातील होती. आजूबाजूला माकडं उड्या मारत होती. हंपीत सर्वत्र विपुल संख्येनं माकडं आहेत. त्यांना सतत खायला लागतं. हातात खाण्याची कुठलीही वस्तू घेऊन तुम्ही मोकळेपणाने फिरू शकत नाही. माकडांनी त्यावर डल्ला मारलाच म्हणून समजा. 
इथून आता मंजूनं त्याची रिक्षा हंपीतल्या दोन प्रमुख ठिकाणांपैकी एक असलेल्या विठ्ठल मंदिराच्या दिशेनं घेतली. इथं मुख्य मंदिरापासून साधारण एक किलोमीटर अंतरापर्यंतच वाहनं नेता येतात. तिथं पार्किंगचा प्रशस्त तळ आहे. तिथून एक तर तुम्ही चालत जाऊ शकता किंवा बॅटरी ऑपरेटेड वाहनांतून जाऊ शकता. आम्हाला उन्हात चालायचं नव्हतं म्हणून आम्ही त्या बॅटरी गाड्यांसाठीची रांग धरली. वीस रुपये तिकीट होतं. त्या रांगेत शिरण्याआधी वॉशरूमकडे धाव घेतली. तिथं पाणीच नव्हतं. बाहेर पिण्याच्या पाण्याचे नळ होते. तिथेही खडखडाट. बाहेर ज्यूस, फळं, उसाचा रस विकणाऱ्या गाड्या होत्या. आम्हाला तहान तहान होत होती. मग उसाचा रस प्यायलो. नंतर रांगेत उभे असतानाही सतत कलिंगडाच्या फोडी, अननसाच्या फोडी, ताक विकायला पोरं येत होती. त्या फोडी एवढ्या रसरशीत होत्या, की त्या घेऊन खायचा मोह आवरला नाही. साधारण २०-२५ मिनिटांनी आमचा नंबर लागला. या बॅटरी गाड्या कॉलेजमधल्या मुलींना चालवायला दिल्या आहेत. इथून पुढचा सगळा रस्ता मातीचा होता. त्यामुळं असेल, पण त्या मुलीनं तोंडाला रुमाल लावला होता. आम्ही दहा मिनिटांत विठ्ठल मंदिराच्या दारात पोचलो. इथं पुन्हा तिकिटांची रांग होती. इथं घेतलेलं तिकीट आणखी दोन-तीन ठिकाणी चालतं. त्यामुळं ते जपून ठेवावं. साठ रुपये तिकीट आहे. इथं गाइड घ्यावा, असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. मंजूच्या मते, गाइड विठ्ठल मंदिराचा संपूर्ण परिसर दाखवण्यास २०० ते ३०० रुपये घेतो. आम्ही ४०० रुपयेही द्यायला तयार होतो. मात्र, इथले गाइड ८०० रुपयांच्या खाली यायला तयार होईनात. गर्दीही प्रचंड होती. फारसे गाइड मुळात उपलब्धच नव्हते. आमच्याकडे अश्विनीनं (मित्र मंदार कुलकर्णीची पत्नी) दिलेलं आशुतोष बापट यांचं ‘सफर हंपी बदामीची’ हे उत्कृष्ट पुस्तक होतं. मग तेच गाइड म्हणून वापरायचं ठरवून आम्ही आत शिरलो. समोर विलक्षण, अद्भुत आणि थक्क करून टाकणारं, असामान्य असं काही तरी आमची वाट बघत होतं....



(क्रमश:)

----------

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

------

23 Nov 2023

पासवर्ड दिवाळी २३ - कुमारकथा

सेल्फी... सेल्फी(श)... सेल्फी...
----------------------------------

एक होतं जंगल... जंगलात नव्हतं काहीच मंगल...
झाडं दु:खी, प्राणी दु:खी, नदी दु:खी, नद्यांमधले मासेही दु:खी....
खरं तर एके काळी हे जंगल किती आनंदात असायचं! झाडं खूश असायची, प्राणी आनंदात उड्या मारत असायचे, नदी हसत-खळाळत वाहत असायची... मासेही मजेत पोहत असायचे. पाऊस पडला, की जंगल कसं हिरवंगार होऊन जायचं. उंचच उंच गवत उगवून यायचं. त्यातून हत्तीदादांचं कुटुंब मोठ्या डौलानं, दमदार पावलं टाकीत पाण्याकडं चालत जायचे. हरणांचे कळप उड्या मारत इकडून तिकडं हुंदडत असायचे... कोल्होबा, लांडगेभाऊ, तरसतात्या, अस्वलमामा, गेंडेदादा सगळेच एकदम मस्त खेळायचे अन् लोळायचेही.
पण अलीकडं काही वर्षांत हे चित्र बदललं की हो! जंगल पूर्वीसारखं राहिलं नाही. उदास उदास राहू लागलं. मनातल्या मनात कुढू लागलं. सगळेच झाले दु:खी... सगळेच झाले कष्टी...
का विचारा... अहो, या जंगलात माणसं येत असत रोज... भटकत असत इतस्तत: सतत... त्यांना ना काळ ना वेळ... सतत हसणं अन् खिदळणं... सोबत त्यांची ती रंगीत चौकोनी डबी... तो फोन... स्मार्टफोन म्हणे... प्रत्येकाच्या हातात फोन आणि प्रत्येकाचा वेगळाच टोन... सतत माणसं आपली सेल्फी काढताहेत... धबधबा म्हणू नका, पायवाटा म्हणू नका, दगड म्हणू नका की धोंडा म्हणू नका...! प्रत्येकावर यांच्या नावाचा शिक्का उमटलाच पाहिजे, प्रत्येक ठिकाणावर यांची सेल्फी निघालीच पाहिजे... जंगलातलं एक झाड यांनी सोडलं नाही, की एक वेल सोडली नाही! सगळीकडं सेल्फीचाच पूर आला... हल्ली तर कहरच झाला... माणसांच्या टोळ्या झाल्या... टोळ्यांमागून टोळ्या... सगळेच हातात बाटल्या घेऊन नाचत आहेत, सगळेच कसल्याशा धुंदीत लहरत आहेत... त्यांच्या त्या कर्णकर्कश आवाजांतील गाण्यांनी आणि धांगडधिंगाण्याने जंगलाचे कान किटले. अति झाले...

सारे जंगल वैतागले. प्राणी सगळे वैतागले.... हत्तीदादाकडे गेले... झाडे सगळी त्रस्त झाली... वडआजोबांकडे गेली. प्राणी म्हणाले, ‘हत्तीदादा, हत्तीदादा... या माणसांच्या टोळीचा बंदोबस्त करा. यांच्या फोटोंचा धुमाकूळ थांबवा.’ झाडे म्हणाली, ‘वडआजोबा, वडआजोबा... या माणसांच्या टोळ्या आवरा. तुमच्या पारंब्यांची बेडी अडकवून सगळ्यांना धरून बांधून टाका...’
हत्तीदादा विचारात पडले. वडआजोबांकडे गेले. दोघांनी मिळून विचार केला. माणसांच्या फोटोच्या कटकटीला कसे दूर करावे? कसे बरे? माणसांची गर्दी कशी हटवावी? कशी बरं कशी? त्यांनी प्राण्यांची आणि झाडांची बोलावली सभा... पौर्णिमेच्या रात्री सगळं जंगल सभेला जमलं. वडआजोबा अध्यक्षस्थानी होते, तर हत्तीदादा प्रमुख वक्ते. हत्तीदादा म्हणाले, ‘मित्र हो, आपलं हे जंगल, आता नाही राहिलं मंगल... याचं कारण माणूस आणि त्याच्या हातातली ती चौकोनी चमकती डबी. त्या डबड्यापायी आपल्या जंगलाची लागली वाट... आता करावाच लागेल उपाय खास!’
सगळे म्हणाले, ‘हो, हो... करा, करा. आम्हाला पण खूप त्रास होतो. माणसं घोळक्यानं येतात. आवाज करतात... त्यांच्या त्या चौकोनी डब्यातून सतत खटखट करत बसतात... नुसती कटकट! माणसांच्या या गोंधळाचा वैताग आलाय आम्हाला...’
सगळे वडआजोबांकडे बघायला लागले. त्यांच्या पारंब्या शालीसारख्या त्यांनी अंगावर लपेटून घेतल्या आणि जरासं खाकरून ते बोलू लागले, ‘तुमचं म्हणणं खरं आहे. मी गेली शंभर वर्षं तरी या जंगलात राहतोय. आधी इथं असं नव्हतं. माणसं फार कमी यायची इकडं... उलट सगळे प्राणी मस्त खेळायचे आजूबाजूला... झाडंही पावसात हिरवीगार होऊन छान डोलत असायची... पण गेल्या २०-२५ वर्षांत सगळं बदललं. माणसं एकाएकी मोठ्या संख्येनं जंगलात यायला लागली. त्यांच्या गाड्यांचे आवाज होऊ लागले. त्या गाड्या धूर सोडू लागल्या. काही माणसं तर बंदुका घेऊन यायला लागली. त्यांनी आपले प्राणी मारायला सुरुवात केली. अलीकडं तर ते सगळे ती चौकोनी चमकदार रंगीत डबी घेऊन येतात आणि त्यातच बघत बसतात... आपल्याला होणारा त्रास असह्य झाला आहे. यावर आता एकच उपाय - माणसं आपल्याकडं जातात, तसं आपण माणसांकडं फिरायला जायला सुरुवात करायची... मान्य आहे?’
सभेत एकच गदारोळ उडाला. हा उपाय आहे? असं कसं शक्य आहे? माणसं आपल्याला जिवंत सोडतील? किती भयानक, क्रूर असतात माणसं! कसं जमणार हे? सगळे प्राणी, झाडं एकदम गलका करू लागले. माणसांकडे जाण्याची कल्पना अनेकांना फार भारी वाटत होती, तर काहींना त्यात अतोनात धोका जाणवत होता. काय करावं? कसं करावं? सगळ्यांचा एकच गोंधळ सुरू झाला. तितक्याच बिबटेराव पुढे झाले. म्हणाले, ‘वडआजोबा, तुमचं म्हणणं आम्हाला एकदम मान्य आहे. आम्ही जाऊ आधी माणसांच्या शहरांत फिरायला...’ यावर वानरकाका पुढं झाले आणि प्रौढपणानं म्हणाले, ‘तुमचं काय कौतुक हो? आम्ही तर आधीपासून जातोय माणसांकडं... त्यातली काही लोकं आमच्याहून अधिक आचरटपणा करतात ते सोडा...’
सगळे हसले. कोल्होबा पुढं आले. शहाजोगपणे म्हणाले, ‘मी या तरसतात्याला घेऊन जातो कसा माणसांच्या वस्तीत...’ हरणांचे टोळीप्रमुख आले आणि म्हणाले, ‘आम्ही सगळे एकदम जाऊ आणि त्यांच्या शेतात घुसू...’ हे ऐकून झाडांनी आपल्या फांद्या एकमेकांवर आपटून जोरजोरात टाळ्या वाजवल्या... ससोबा उड्या मारू लागले, अस्वलमामांनी जोरजोरात छाती पिटायला सुरुवात केली, हरणं कळपासह टणाटण उड्या मारू लागली.... सगळीकडं एकदम आनंदीआनंद झाला. अवघं जंगल खूश झालं!
वडआजोबांनी सगळा प्लॅन नीट समजावून सांगितला. सगळं ठरलं. माणसांच्या वस्तीवर हल्लाबोल करायचा...
माणसांनी आपल्याला आत्तापर्यंत बराच त्रास दिला. सगळ्या जंगलात येऊन ऊतमात केला. वाट्टेल तसं वागले. सगळ्यांची शांतता घालवून टाकली. झाडांना दु:ख दिलं, नदीला रडायला लावलं, प्राण्यांना वेदना दिल्या, पक्ष्यांना छळलं... आता या सगळ्या गोष्टींचा बदला घेण्याची वेळ आली होती. आता जंगल माणसांना मुळीच माफ करणार नव्हतं. त्यांना चांगलाच धडा शिकवणार होतं... आता फार गंमत येणार होती!
सुरुवातीला आपले बिबटेराव आणि त्यांचे मित्र चालून गेले. आधी गावांबाहेरच्या वस्तीत, मग उसाच्या शेतात... मग गावातल्या घरांत, मग एकदम मोठ्या शहरांत, त्यांच्या सोसासट्यांत, बंगल्यांत... बिबटे सगळीकडं शिरले... मग हळूहळू धिप्पाड बांध्याचे गवेही त्यांच्यामागोमाग गेले. गव्यांना अडवणार कोण? ते सुखेनैव शहरांच्या रस्त्यांवरून फिरू लागले. मग हरणांचा कळप घुसला... टणाटण उड्या मारत गावागावांमधून फिरू लागला. शेतात घुसू लागला, वस्त्तीत शिरू लागला. सगळीकडं गोंधळ उडाला.... एकदम हलकल्लोळ उडाला. माणसं बावचळून गेली. घाबरून गेली. त्यांना काय करावं ते सुचेना. जंगल कसं आवरावं, ते कळेना. जंगलातील वडआजोबा लांबून हे सगळं बघत होते... आता माणसं चांगलाच धडा शिकतील, असं त्यांना वाटू लागलं. माणसांना बरी अद्दल घडली, असं सगळ्यांना वाटू लागलं...
तेवढ्यात एक अजब दृश्य त्यांना दिसलं... त्या चौकोनी डब्या घेऊन शेकडो माणसं पिंजऱ्यात बंद केलेल्या  बिबट्यांच्या मागे धावत होती. माणसं मोठी चतुर! त्यांनी कसल्याशा बंदुकीतून डार्ट मारून बिबटेमंडळींना पाडलं बेशुद्ध... आणि घातलं एका मोठ्या गाडीत! ती गाडी निघाली कुठं तरी... मग काय, सगळी माणसं आता त्या बिबट्यांच्या मागं मागं धावू लागली. सगळ्यांना त्या बिबट्यांसोबत सेल्फी काढायचा होता... ते बघून वडआजोबांनी कपाळाला हात लावला. करायला गेलो काय आणि झालं काय हे भलतंच, असं त्यांना होऊन गेलं.
तेवढ्यात एक कोल्होबा त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, ‘आजोबा, हे बघा, मी काय आणलंय?’ वडआजोबांनी बघितलं, तर ती चमकदार चौकोनी डबी... ससोबा म्हणाले, ‘आजोबा, हा स्मार्टफोन आहे. मी माणसांकडून पळवून आणला आहे.... आता तुमच्याबरोबर मला सेल्फी काढायचा आहे...’ वडआजोबांना काय बोलेना, हेच समजेना. त्यांनी रागारागाने आपल्या पारंब्या आपटल्या. कोल्होबांना त्याचे काही नव्हते. त्यांनी ऐटीत सेल्फी काढला आणि ते तिथून निघाले.
हळूहळू सगळ्या जंगलात कोल्होबांनी सेल्फी काढायचा सपाटा लावला. तिकडं माणसं शहरांत बिबट्यांसोबत सेल्फी काढू लागली आणि कोल्होबा जंगलात झाडांसोबत सेल्फी काढू लागले... जंगल मंगल झाले! सेल्फीत दंग दंग झाले...

---

(पूर्वप्रसिद्धी : पासवर्ड दिवाळी अंक (युनिक फीचर्स), २०२३)

---

मनशक्ती दिवाळी २३ लेख

‘आमच्या वेळी असं नव्हतं...’
----------------------------------

दोन पिढ्यांमधलं अंतर स्पष्ट करणारं आणि नेहमी ऐकू येणारं वाक्य म्हणजे - ‘आमच्या वेळी असं नव्हतं’... सतत हे वाक्य उच्चारणाऱ्यांना आपली पिढी काळाच्या स्पर्धेत मागं पडत चालल्याचा एक विचित्र अपराधगंड असतो बहुतेक! वास्तविक दोन पिढ्यांमध्ये काळाचं जसं स्वाभाविक अंतर असतं, तसंच ते इतर सर्व बाबतींत असणार, हे उघड आहे. तरीही आमच्या वेळी असं नव्हतं, हे सांगण्याचा अट्टाहास बहुतेक मंडळी का करतात देव जाणे. खरं तर नव्या पिढीशी दोस्ती करणं अवघड नाही. त्यासाठी मनाचा मोठेपणा मात्र हवा. मुलाला पित्याच्या चपला यायला लागल्या, की त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण होतं किंवा व्हायला पाहिजे, असं एका संस्कृत श्लोकात सांगितलं आहे. मात्र, आपल्यापैकी किती जणांना आपल्याच मुलांशी असं मैत्रीचं नातं प्रस्थापित करता येतं?
यातही गंमत अशी असते, की आपण दर वेळी आपली दोन्ही पिढ्यांशी सतत तुलना करत असतो. एक आपल्या आई-वडिलांची पिढी आणि एक आपल्या मुलांची पिढी. दोन्ही पिढ्यांकडून आपल्यावर अन्याय झाला; आपलं ‘सँडविच’ झालं, असं आत्ताच्या पिढीला मनोमन वाटत असतं. विशेष म्हणजे, प्रत्येक पिढीमध्ये ही भावना दिसते. म्हणजे आपल्या आई-वडिलांनाही त्यांच्या आई-वडिलांविषयी व आपल्याविषयी असंच वाटत असतं. आपल्या मुलांनाही नंतर आपल्याबद्दल आणि त्यांच्या अपत्यांबद्दल असंच वाटणार, हेही नक्की.
आपल्याला कायम आपल्या स्वत:विषयी सहानुभूती वाटत असते. हे अगदी स्वाभाविक आहे. आपलं इतर कुणाहीपेक्षा आपल्या स्वत:वरच प्रेम अधिक असतं. आपण स्वत:ला फार जपत असतो. त्यामुळं आपलं प्रेम, विरह, दु:ख, वेदना, उद्वेग हे जे काही असेल ते इतरांपेक्षा कांकणभर अधिक सरस असतं, असं आपल्याला कायम वाटत असतं. लग्न झालेल्या प्रत्येक बाईला ‘मी होते म्हणून टिकले, दुसरी कुणी असती तर...’ हे जसं वाटत असतं, तसंच आपल्याला ‘मी जो त्याग केला, ते केवळ मी होतो म्हणून; बाकी कुणी असतं तर...’ असंच वाटत असतं. आपण चांगल्या घरात जन्माला आलो, आई-वडील इतर चार लोकांसारखेच होते, आपलं बालपण तसं सुखात गेलं, आयुष्यात फार कटकटी किंवा त्रास न होता, आतापर्यंतचा प्रवास झाला, लग्न वेळेवर झालं, मुलं-बाळं वेळेवर झाली, नोकरीत फार काही जाच नव्हता, मुलंही नीट शिकली, पैसे खर्च होत असले तरी आवकही बऱ्यापैकी होती, कष्टाने पैसे कमावले व चार गाठीलाही बांधले... हे सहसा पटकन कबूल करायला कुणी तयार होत नाही. खरं म्हणजे आपल्याकडे शंभरातील ८० ते ९० लोकांचं जीवन असंच गेलेलं असतं. मात्र, त्या आयुष्याला आपल्या कथित कष्टांचा, त्यागाचा तडका लावल्याशिवाय जीवनाची इतिकर्तव्यता झाली, असं आपल्याला वाटतच नाही. तसं बघायला गेलं, तर प्रत्येक पिढी त्या त्या काळानुसार जगत असते. त्या काळात जे जे उपलब्ध आहे, त्याचा आनंद घेत असते. जे नाही त्याचा त्या पिढीला खेद वा खंत असं काही नसतं. माणसाला साधारणपणे ८० वर्षांचं सरासरी आयुष्य मिळतं. म्हटलं तर हा काळ मोठा आहे. या काळात बरेच बदल घडून येऊ शकतात. अगदी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचं उदाहरण घेतलं, तर यंदा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षं पूर्ण झाली. आपल्यापैकी अनेकांनी तो काळ बघितलेला नाही. मात्र, देशाला मिळालेलं स्वातंत्र्य बघितलेले लोकही आज आहेत. तेव्हा ते अगदी लहान असतील, पण ती घटना त्यांना स्पष्ट आठवते आहे. आज साधारण ८५ ते ९० वय असलेले अनेक लोक आपल्यामध्ये आहेत. या सर्वांना देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन नीट आठवत असणार. त्यानंतरच्या सर्व घटना-घडामोडीही आठवत असणार. आपल्याकडे एखाद्याच्या वयाचा उल्लेख करायचा, तर ‘मी अमुक पावसाळे पाहिले आहेत,’ असं म्हणण्याचा प्रघात आहे. याचा अर्थ तेवढे ऋतू पाहिले; तेवढी वर्षं पाहिली. काळाशी निगडित या सगळ्या आठवणी सापेक्ष असतात. कुणाला ६० वर्षं म्हणजे खूप जुना काळ वाटतो, तर कुणाला २० वर्षं म्हणजेही खूप पूर्वीची गोष्ट झाली, असं वाटू शकतं.
मध्यंतरी माझ्याच बाबतीत झालेली एक गंमत सांगायला हवी. दुपारी जेवत असताना, सहज चॅनेल सर्फिंग करत होतो. ‘सह्याद्री’ वाहिनीवर ‘तराने पुराने’  कार्यक्रम सुरू होणार असल्याची पाटी दिसली. ‘व्वा’ असं म्हणून मी एखादं जुन्या काळचं कृष्णधवल गीत सुरू व्हायची वाट बघू लागलो. तर गाणं लागलं - अजनबी मुझ को इतना बता... हे तर ‘प्यार तो होना ही था’ या चित्रपटातलं (१९९८) काजोल व अजय देवगण यांच्यावर चित्रित झालेलं गाणं. मनात विचार आला, अरेच्चा! हा तर आपल्या डोळ्यांसमोर रीलीज झालेला आणि थिएटरला जाऊन पाहिलेला सिनेमा आहे राव! पण मग विचार केला, त्यांचंही बरोबरच आहे. झाली की २५ वर्षं आता! हे ‘तराने’ आता ‘पुराने’च म्हणायचे. तर काळाचं हे असं असतं. आपलं वय होत जातं; पण आपल्याला अनेकदा ते स्वीकारायचं नसतं. सगळं आपल्या काळात जसं चाललं होतं, तसंच पुढच्या सर्व काळात चालायला पाहिजे, असं आपल्याला वाटत असतं. यातली गंमत अशी, की काळानुरूप झालेले सर्व आधुनिक बदल, तंत्रज्ञानादी सोयी, सुखासीनता यांच्याबाबत आपल्याला काही आक्षेप नसतो. ते सगळं आपल्याला हवंच असतं. म्हणजे उदाहरणार्थ, आज चाळिशीत असलेल्या व्यक्तीच्या विशीत स्मार्टफोन नव्हते, म्हणून वीस वर्षांपूर्वीचा काळच कसा चांगला होता, म्हणत उसासे टाकणाऱ्या त्याच व्यक्तीला स्मार्टफोनचा विरह मात्र वीस सेकंदही सहन होत नाही.
‘आमच्या वेळी असं नव्हतं,’ असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा आपल्या मनात नक्की कोणती भावना असते? खूप प्रामाणिकपणे उत्तर देता येईल का आपल्याला? आपल्याला आपल्या काळात नसलेल्या व आता उपलब्ध असलेल्या काही गोष्टींचा उपभोग आता वयपरत्वे घेता येत नाही, याची काहीशी असूया तर वाटत नसते ना? मागच्या पिढीत आणि पुढच्या पिढीत आपलं ‘सँडविच’ झालं असं म्हणताना, खरं तर आपल्याला ‘आम्हाला दोन्ही पिढ्यांचे फायदे मिळाले नाहीत,’ असं काहीसं विषादानं वाटत असतं. आधीच्या पिढ्यांमधला कौटुंबिक जिव्हाळा, सामाजिक सौहार्द, व्यक्तिगत जिव्हाळा, शांत-संथ ग्रामीण जीवन किंवा चाळीतलं वा वाड्यातलं आपुलकीचं जीवन आपल्याला हवं असतं, तर नव्या पिढीच्या वाट्याला आलेली भौतिक संपन्नता, तंत्रज्ञानातील प्रगती, सढळ हाताने पैसे खर्च करण्याची ताकद, एसी घरांपासून ते विमानप्रवासापर्यंतच्या सर्व गोष्टी याही आपल्याला हव्या असतात. दोन्ही गोष्टी अर्थात एकाच वेळी मिळू शकत नाहीत. मग हा संघर्ष उभा राहतो आणि आपण काहीसं खंतावून, काहीसं वैतागून म्हणतो - ‘आमच्या वेळी असं नव्हतं...!’
खरं तर प्रत्येक पिढीसमोर काही ना काही तरी आव्हानं उभी असतातच. ती बरीचशी त्या काळानं उभी केलेली असतात. काही गोष्टी चांगल्या असणार, तर काही वाईट हे अगदी गृहीत आहे. आजच्या तरुणांबाबत, म्हणजे पुढच्या पिढीबाबत बोलायचं झालं, तर त्यांच्यासमोरही चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेतच. काळ वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञानाची प्रगती अतिशय वेगाने होत असल्यानं या बदलांचाही वेग प्रचंड आहे. नव्या पिढीला या वेगाशी जमवून घेण्याचं मोठं आव्हान आहे. हल्ली ‘एआय’ अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा खूप बोलबाला आहे. या ‘एआय’चं मोठं आव्हान आजच्या तरुण पिढीसमोर आहेच. स्मार्टफोनमुळं आपलं जगणंच कसं पूर्ण बदलून गेलं, हे आपल्या पिढीनं गेल्या १२-१५ वर्षांत नीट अनुभवलं आहे. आता कदाचित त्याहून अधिक वेगवान आणि स्तिमित करणारे बदल ‘एआय’मुळे घडू शकतील. किंबहुना आत्ताच घडत आहेत. यंत्र मानवाची जागा घेऊ शकत नाही, असे आपल्याला आतापर्यंत वाटत होते. मात्र, आता तसे काही प्रमाणात का होईना, घडण्याची चिन्हे दिसत आहे. त्यातून निराळेच सामाजिक, सांस्कृतिक व मानसिक प्रश्न उपस्थित होणार आहेत. नव्या पिढीलाच त्यांचा सामना करावा लागणार आहे. गेल्या काही वर्षांत पर्यावरणात प्रतिकूल बदल घडताना दिसत आहेत. त्यामुळेच वादळे, महापूर, भूस्खलन आदी भौगोलिक संकटे वाढताना दिसत आहेत. या संकटांचा सामना पुढच्या पिढीलाच करायचा आहे. याशिवाय वाढती लोकसंख्या, वाढती धार्मिकता, वाढता कट्टरतावाद, वाढता उन्माद, वाढता हिंसाचार या सगळ्यांना तोंड देण्याची तयारी तरुण पिढीला करावी लागणार आहे.
अर्थात या तरुण पिढीकडे असलेल्या चांगल्या गोष्टीही कमी नाहीत. एक तर ही तरुण पिढी अतिशय स्मार्ट आहे. हुशार आहे. हे सगळे तरुण अतिशय ‘सॉर्टेड’ आहेत. त्यांना आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही, याचं नेमकं भानही आहे. त्या जोरावर ते ही नवी आव्हानं नक्कीच पार पाडतील. त्या तुलनेत आपल्या आधीची पिढी आणि अगदी आपली म्हणजे आत्ता चाळिशीत किंवा पन्नाशीत असलेली पिढी यांना खरोखरच याहून कमी आव्हानांना तोंड द्यावं लागलं आहे, हे मान्य करायला हवं. करोनाकाळ हा एक अपवाद. मात्र, ते संकट अवघ्या मानवजातीनंच पेललं. त्यात ही पिढी, पुढची पिढी असा काही भेद मुळातच नव्हता. त्या तुलनेत आता टीनएजमध्ये किंवा विशीत असलेल्या तरुणाईला अधिक व्यापक आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे, हे निश्चित. मात्र, ही तरुण पिढी या सर्व आव्हानांना पुरून उरेल आणि एक आदर्श, सुखवस्तू आणि समाधानी असा देश घडवू शकेल, यात अजिबात शंका बाळगायला नको. संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजीमहाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई ते स्वामी विवेकानंद अशा अनेक शूर स्त्री-पुरुषांनी अगदी कमी वयात फार मोठे पराक्रम गाजवले आणि काळाच्या पटावर आपली लखलखीत नाममुद्रा कोरून ठेवली. भारतातील तरुणांपुढे असे उत्तुंग आदर्श असल्याने त्यांनाही ही उंची गाठण्याची आस असणारच.
तेव्हा ‘आमच्या वेळी असं नव्हतं,’ हे रडगाणं गायचं बंद करून, नव्या पिढीसाठी ‘कुठल्याच काळात कधीच नव्हतं, असं भव्य काही तरी निर्माण करा’ असा आशीर्वादाचा उद्गार आपल्या मुखातून बाहेर यावा, हीच सदिच्छा!


---

(पूर्वप्रसिद्धी : मनशक्ती दिवाळी अंक २०२३)

---

7 Oct 2023

वहिदा रेहमान - मटा लेख

‘वहिदा’ नावाचं लोभस स्वप्न
---------------------------------

वहिदा रेहमान म्हणजे मूर्तिमंत भारतीय सौंदर्य. या वहिदाचं माझ्या पिढीतल्या कित्येकांच्या आयुष्यातलं आगमन टीव्हीच्या छोट्या पडद्यातूनच झालं. म्हणजे तेव्हा ‘चित्रहार’ किंवा ‘छायागीत’मध्ये ‘भँवरा बडा नादान’ किंवा ‘चौदहवी का चाँद’ वगैरे गाणी लागायची, तेव्हाच पाहिलं असणार. माझं वय १२ असताना आमच्या घरी पहिल्यांदा टीव्ही आला. स्वाभाविकच तेव्हाच्या माझ्या ‘फेवरिट लिस्ट’मध्ये वहिदा नव्हती. ती जागा निर्विवादपणे मधुबालानं व्यापली होती. मधुबाला ते माधुरी दीक्षित अशी रेंज मी चार वर्षांतच गाठली. पण वहिदाचं सौंदर्य समजायला चाळिशी यावी लागली.
वहिदा रेहमान हे गुरुदत्तचं ‘फाइंड’. हैदराबादवरून तिला मुंबईला कसं आणलं याची सुरस कथा अबरार अल्वींनी त्यांच्या पुस्तकात लिहिली आहे. ती मुळातूनच वाचायला हवी. वहिदाला स्वतःच्या बलस्थानांचं नेमकं भान होतं. ती एक उत्तम अभिनेत्री आणि नर्तिका होतीच (म्हणजे आहे); पण त्याच जोडीला अत्यंत चोखंदळ भूमिका करून तिनं भारतीय पडद्यावर आपलं जे वेगळेपण निर्माण केलं ते तिच्या बुद्धिमत्तेची झलक दाखवणारं आहे. ‘प्यासा’मधील गुलाबो असो, ‘रेश्मा और शेरा’मधली रेश्मा असो, ‘खामोशी’मधली राधा असो किंवा अर्थातच ‘गाइड’मधली तिची अजरामर रोझी असो... आपल्या मूर्तिमंत भारतीय सौंदर्यानं तिनं सर्वत्र आपली छाप उमटवली. अत्यंत बोलके व पाणीदार डोळे आणि तेवढाच सर्व भाव व्यक्त करणारा चेहरा हे वहिदाचं वैशिष्ट्य. नृत्यनिपुण तर ती होतीच, म्हणूनच तर अगदी १३-१४ वर्षांपूर्वी आलेल्या ‘दिल्ली-६’मध्ये ‘ससुराल गेंदा फूल’ या गाण्यावर तिला नव्या अभिनेत्रींसोबत थिरकावंसं वाटलं.
‘भंवरा बडा नादान है’ या गाण्यातली चंचलता, ‘चौदहवी का चांद’मधली अप्रतिम निरागसता, ‘उपरवाला जान कर अंजान है’ या गाण्यातले तिचे ते ‘आपण नाही बाबा, हा वरच्या देवाला गाणं म्हणतोय’ असं सांगणारे खट्याळ भाव, ‘ये श्याम कुछ अजीब है’ या गाण्यात, नदीतलं पाणी चेहऱ्यावर आल्याक्षणी झर्रकन बदलणारा चेहरा आणि जुन्या आठवणींनी दाटून येणारा ‘दर्द’ निमिषार्धात चेहऱ्यावर दाखवणारे तिचे ते डोळे, ‘पान खाए सैंया हमारो...’ म्हणतानाची तिची चुलबुली अदा, देवसोबत ‘आज फिर जीने की तमन्ना है...’ म्हणताना बिनधास्त रस्त्यावर फेकून दिलेला तो मटका, विश्वजितसारख्या ‘अभिनेत्या’सोबत ‘ये नयन डरे डरे...’ गाण्यात दाखवलेलं परिणितेचं साक्षात रूप... वहिदाच्या एकेका विभ्रमावर जीव ओवाळून टाकावासा वाटतो.
‘पिया तोसे नैना लागे’ गाण्यात नाकापेक्षा किंचित जडच अशी ती मोठ्ठी नथ आणि लालभडक साडी नेसून तिनं उभी केलेली मराठी स्त्री अजूनही नजरेसमोरून हटत नाही. अंगप्रदर्शन तर सोडाच; पण कधी उघडा दंडही न दाखवणाऱ्या या अभिनेत्रीनं साठ अन् सत्तरच्या दशकात तमाम भारतीय पुरुषांच्या मनात अढळ स्थान का मिळवलं होतं, ते तिचे तेव्हाचे सिनेमे पाहिलं तरच थोडं फार कळू शकेल. मध्यमवर्गीय पुरुषांच्या फाटक्या बनियनसारख्या आयुष्यात सिनेमा नट्यांच्या रूपानं असंख्य झुळुका येत असतात. पण वहिदासारखी ‘वाइफ मटेरियल’ एखादीच! त्यामुळंच वपुंना ‘मीच तुमची वहिदा’सारखी (नावाबाबत चु. भू. दे. घे.) कथा लिहावीशी वाटते. पुलंच्या ‘पाळीव प्राणी’मध्येसुद्धा फोटो दाखवणाऱ्यांच्या कथेत ‘इश्श...! वहिदा रेहमान’ येते.

गुरुदत्तसारख्या द्रष्ट्या दिग्दर्शकानं तिला सर्वप्रथम अखिल भारतीय स्तरावर पेश केल्यानं असेल, व्ही. के. मूर्तींसारख्या अभिजात सिनेमॅटोग्राफरच्या नजरेचा लाभ झाल्यानं असेल, पण वहिदा इतर अभिनेत्रींच्या तुलनेत फारच वेगळी ठसत होती. (अशीच दुसरी अभिनेत्री होती नूतन!) वहिदाच्या सौंदर्यात, हिंदीतला शब्द वापरायचा तर, एक ‘सादगी’ होती. ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ अशी तिची प्रतिमा सहज तयार होऊ शकत होती. सावळेपणातलं तिचं अद्भुत सौंदर्य ब्लॅक अँड व्हाइट पडद्यावर आणखीनच खुलून दिसलं. तेव्हाच्या प्रेक्षकांसाठी वहिदा नक्की कोण होती अन् काय होती? साठच्या दशकात भारतात सर्वच क्षेत्रांत एक स्वप्नाळूपण होतं. नेहरूंचा करिष्मा अजून टिकून होता, राज कपूर आणि बी. आर. चोप्रांसारखे दिग्दर्शक त्यांच्या प्रभावाखाली डावीकडं झुकलेल्या समाजवादी विचारसरणीचा प्रसार करणारे सिनेमे बनवत होते, भाक्रा-नानगलसारखी धरणं बांधली जात होती आणि सिनेमात सत्यजित राय यांच्यापासून गुरुदत्तपर्यंत अनेक जण आगळेवेगळे प्रयोग करीत होते. कलकत्ता, मुंबईसारखी शहरं आपला आब व रुबाब टिकवून होती. त्यांचं बकाल महानगरांत रूपांतर झालं नव्हतं. किंबहुना देशाची एकमेव स्वप्ननगरी, मायानगरी मुंबापुरीच होती. संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन अजून धगधगायचं होतं. या काळात म्हणजे १९५४ मध्ये वहिदा मुंबईत आली. या स्वप्नाळू दशकाचा चेहरा म्हणून अनेक पुरुषांचं नाव घेता येईल. किंबहुना नेहरूंपासून राज कपूरपर्यंत अनेकांचं घेतलंही जातं. मात्र, या नवभारताचा तरुण, सोज्वळ आणि सात्त्विक सौंदर्य ल्यायलेला स्त्री-चेहरा कुणाचा असेल तर तो वहिदाचाच होता. (अर्थात इथंही तिच्या जोडीला नूतनचं नाव घ्यावंच लागेल.) तमाम भारतीय पुरुषांना आकर्षित करून घेणाऱ्या या सौंदर्याचं विश्लेषण आत्तापर्यंत अनेक जणांनी केलंय. पण मला वाटतं, तिच्यात जे अंगभूत सौंदर्य होतं, त्याचा उल्लेख फार कमी जणांनी केला आहे. वहिदा अत्यंत आत्मविश्वासू आणि आत्मभान असलेली अभिनेत्री आहे. एक स्त्री म्हणून तिला आपल्या ताकदीचं योग्य ते भान होतं. तिचा आत्मसन्मान तिनं कायम जपला. म्हणूनच तर तिला सिनेमा क्षेत्रात नट्यांना कराव्या लागणाऱ्या तडजोडी कधी कराव्या लागल्या नाहीत. अंगप्रदर्शन न करताही मादक दिसता येतं, हे तिनं केवळ बोलक्या डोळ्यांनी करून दाखवलं. वहिदाचं चित्रपटसृष्टीला काही योगदान असेल तर ते हे आहे. तिच्यामुळं काही भारतीय पुरुष तरी तेव्हा कदाचित स्त्रीचा सन्मान करायला शिकले असतील. मूर्तिमंत भारतीय स्त्रीचं प्रतीक असलेल्या या महान अभिनेत्रीला आता चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. तिचा जन्म १९३८ चा. आता ती जवळपास ८५ वर्षांची आहे. त्या मानानं तिला खूपच उशिरा हा पुरस्कार मिळाला. अर्थात वयाचे हिशेब वहिदासारख्या अजरामर सौंदर्याला लागू होत नाहीत. त्यामुळंच ती या वयातही आपली ‘ग्रेस’ राखून आहे. तिला शुभेच्छा देताना आजही डोळ्यांसमोर तरळतोय तो 'चौदहवी का चाँद'मधला तिचा अप्रतिम निरागस गोड चेहरा... त्या चेहऱ्याला पाहून शायर उगाच नाही म्हणत - चौदहवी का चाँद हो या आफताब हो... जो भी हो तुम, खुदा की कसम, लाजवाब हो...!


---


(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे; २७ सप्टेंबर २०२३)

---------------

3 Oct 2023

लंडनला जाताय? मग हे वाचा...

लंडन प्रवास मार्गदर्शिका 
------------------------------


लंडनवारीचे ब्लॉग वाचल्यानंतर अनेकांनी लंडनला जायचे असल्यास काय काय करावे आणि काय करू नये, याची विचारणा केली. मी शेवटचा ब्लॉग याच विषयावर लिहिणार होतो. परंतु त्यापेक्षा थेट फेसबुकवर पोस्ट केल्यास अधिक जणांपर्यंत पोचेल असं वाटलं. त्यामुळे इथंच लिहितो आहे. (पण अखेर पुन्हा हा मजकूर आता ब्लॉगवर घेतो आहे; कारण फेसबुक पोस्ट शोधून लिंक देणं जरा कठीण आहे...) 
तर लंडनवारी... पूर्वतयारी आणि इतर उपयुक्त माहिती अशी : 

व्हिसा

१. ब्रिटन किंवा यूके हा देश तसा महागडा आहे. पौंड व रुपया यांचा विनिमय दर जवळपास १०७ रुपयांना एक पौंड असा (सध्या) आहे. हा कमी किंवा जास्त होऊ शकतो. मात्र, कमी झाल्याचा इतिहास नाही. 

२. व्हिसा मिळताना ‘युनायटेड किंगडम’चा मिळतो. कमीत कमी सहा महिन्यांचा ते जास्तीत जास्त दहा वर्षांचा मिळू शकतो. पर्यटक म्हणून जात असल्यास सहा महिन्यांचा काढावा. यासाठी साधारण १४ हजार रुपये प्रतिव्यक्ती फी आहे. मात्र, ब्रिटनने अलीकडेच या व्हिसा फीमध्ये वाढ केल्याचे माझ्या वाचनात आले. ऑक्टोबरपासून ती वाढ लागू होणार आहे. त्यामुळे दीड ते दोन हजार रुपये वाढतील, असे गृहीत धरा.

३. पुण्यात व्हीएफएस या कंपनीकडे अनेक देशांच्या व्हिसाचे काम होते. ही कंपनी एजंटसारखे काम करते. पूर्वी विमाननगरला ऑफिस होतं. आता वानवडीत आहे. अमेरिकेच्या व्हिसासाठी फक्त मुंबईला जावे लागते आणि तिथं इंटरव्ह्यू असतो. ब्रिटनच्या व्हिसासाठी (किंवा अन्य कुठल्याही देशाच्या व्हिसासाठी) मुलाखत वगैरे काही नसते.

४. खासगी ट्रॅव्हल एजंटकडून व्हिसासाठी अर्ज केल्यास ते आणखी अडीच ते तीन हजार रुपये प्रति व्यक्ती घेतात. आपल्याला आत्मविश्वास असल्यास आपण स्वत: ऑनलाइन अर्ज करू शकतो. आम्ही या वेळी एजंटच्या माध्यमातून व्हिसा मिळविला. मात्र, पुढच्या वेळी स्वत: ऑनलाइन अर्ज करणार हे नक्की.

५. अर्ज केल्यानंतर साधारण १५ दिवसांत व्हिसा येईल, असे एजंट सांगतात. पुण्याहून आपले अर्ज मुंबईतील यूके कौन्सुलेटमध्ये जातात. तिकडून मंजूर होऊन आल्यावर व्हिसाचा शिक्का असलेले पासपोर्ट घरपोच येतात. त्यासाठीचे कुरिअर चार्जेस आपल्याला अर्ज करतानाच भरावे लागतात. आता व्हीएफएस किंवा कुठेही रोख रक्कम घेतली जात नाही. सर्व पेमेंट कार्डने किंवा ऑनलाइनच होते. त्याची रीतसर पावती आपल्याला मिळते. आमचा व्हिसा आठवड्यात आला. (यापूर्वी आम्हाला २०२० मध्ये मिळाला होता, मात्र, तेव्हा कोव्हिडमुळे जाता आले नव्हते. मात्र, त्यांच्याकडे तशी नोंद असणार. त्यामुळे व्हिसा मिळणे सोपे गेले.)

६. व्हिसासाठी भरपूर कागदपत्रे, प्रॉपर्टीचे तपशील मागतात. तीन वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न, बँक खात्यांची सहा महिन्यांची स्टेटमेंट, प्रॉपर्टी टॅक्स असं आपल्याकडं जे जे आहे ते सगळं द्यावं लागतं. विमानाची तिकिटे आधी काढलेली असण्याची आवश्यकता नाही. मात्र, काढलेली असल्यास ती जरूर जोडावीत. त्यांना तुम्ही परत येणार आहात, याची खात्री हवी असते. त्यामुळे रिटर्न तिकिटे असतील, तर व्हिसा मंजूर होणे सोपे जाते.

७. नोकरी करत असाल, तर रजेचा अर्ज व पुन्हा कुठल्या तारखेला जॉइन होणार हे सांगणारे वरिष्ठांच्या सहीचे पत्र लागते.

८. तुम्ही तिथे नातेवाइकांकडे जाणार असाल, तर त्यांची सगळी कागदपत्रे आणि आमंत्रणाचे पत्र लागते. त्यांचा पासपोर्ट, तिकडचा व्हिसा, घरच्या पत्त्याचा पुरावा असं सगळं जोडावं लागतं.

९. हॉटेलमध्ये राहणार असाल, तर त्या हॉटेलचे कन्फर्म बुकिंग, पत्ता, त्यांची मेल असं सगळं लागतं.


चलन, फॉरेक्स कार्ड

१. ब्रिटनचे चलन पौंड आहे. तिकडे आता बहुतांश व्यवहार कॅशलेस होतात. त्यामुळे पूर्वीसारखे इकडून नोटांच्या रूपात परकीय चलन न्यायची गरज नाही. नेलेच तर अगदी थोडे, म्हणजे अगदी १०० पौंड एवढेच नाममात्र न्यावे. खरं तर एवढ्याही रोख चलनाची तिथे गरज पडत नाही.

२. फॉरेक्स कार्ड प्रत्येकाकडे अत्यावश्यक आहे. तिथे बस किंवा अंडरग्राउंड ट्रेनसाठी हे कार्ड अतिशय उपयुक्त आहे. हे कार्ड नसेल तर आपण सार्वजनिक वाहनाने प्रवास करूच शकत नाही. प्रत्येक वेळी तिथे हे कार्ड टॅप करावे लागते. ते कार्ड काँटॅक्टलेस असेल याची खात्री करून घ्यावी. आम्ही एचडीएफसीची फॉरेक्स कार्डं नेली होती. या कार्डासाठी बँक ५९० रुपये एकरकमी घेते. कार्ड मिळण्यासाठी आपले खाते त्या बँकेत असणे आवश्यक आहे. शिवाय पासपोर्ट, आधार, पॅन हे या कार्डासाठीच्या अर्जाला जोडावे लागते.

३. ऑयस्टर कार्ड - लंडन म्हटलं, की अनेकांना ऑयस्टर कार्ड आठवते. हे तिथल्या सार्वजनिक वाहतुकीसाठीचे उपयुक्त कार्ड आहे. मात्र, आपण नेलेले फॉरेक्स कार्डही बस किंवा अंडरग्राउंड ट्रेनला चालत असल्याने वेगळे ऑयस्टर कार्ड घेण्याची मुळीच गरज नाही. ऑयस्टर कार्ड फक्त बस किंवा ट्रेनला चालते. आपले कार्ड हॉटेल किंवा अन्यत्र कुठेही चालते. त्यामुळे ते एक कार्ड असले, की पुरेसे आहे.

४. किती चलन अपलोड करावे? - आपण आठ ते दहा दिवसांसाठी जाणार असू आणि आपल्या नातेवाइकांकडे राहण्याची सोय असेल, तर ५०० पौंड एका कार्डावर अपलोड केले तरी रग्गड होतात. 

५. महत्त्वाचे - एकदा लंडनमध्ये पाय टाकला, की दर वेळी एवढे पौंड गेले म्हणजे एवढे एवढे रुपये गेले, असा सतत विचार करू नये. पौंडातच विचार करावा व तसे खर्च करावेत. नाही तर फ्रस्टेशन येण्याची शक्यता असते.


सिम कार्ड

१. आम्हाला व्हिसाबरोबर तीन सिम कार्डं गिफ्ट मिळाली होती. ती लंडनमध्ये उतरल्याबरोबर activate झाली. याचा चांगला उपयोग झाला. शिवाय मी 'एअरटेल'चा दहा दिवसांचा इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन घेतला होता. (२९९९ रु.) हे रोमिंग आम्ही जाताना कैरोला थांबलो होतो, तिथंही चाललं. (आधी त्यांच्या साइटवर इजिप्त व यूके वेगवेगळ्या यादीत दाखवले होते. प्रत्यक्षात यूकेसाठी घेतलेलं रोमिंग इजिप्तमध्येही चाललं...

२. मला विचाराल, तर आपल्या सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडून रोमिंग activate करून घेतलेलं चांगलं. आपले नंबर आपल्या फॉरेक्स कार्डला जोडलेले असतात. त्याचे एसएमएस यायला हवे असतील (आणि ते यावेत अशी सोय असावी) तर आपल्याच नंबरवर इंटरनॅशनल रोमिंग घेणं इष्ट. आम्हाला मिळालेल्या तीन कार्डांचा डेटासाठी चांगला उपयोग झाला. शिवाय लंडनमध्ये काही ठिकाणी त्यांच्याच सिमला रेंज येत होती. तेव्हा दोन्ही सोयी करून ठेवलेल्या बऱ्या. महत्त्वाचं म्हणजे मी मेव्हण्याच्या घरी राहत होतो त्यांचं 'वायफाय' आम्हाला वापरायला मिळत होतं. त्यामुळे गिफ्ट सिमवरचा डेटा बराच वाचला. त्यामुळे आम्हाला तिकडे टॉपअप करायला लागलं नाही. पण एरवी तशी गरज भासू शकते. पण ते सहज कुठेही करता येतं. फार महागही नाही. 


इतर काही Do's & Don'ts

१. लंडनमध्ये गेल्यावर City Mapper नावाचे ॲप आहे ते जरूर डाउनलोड करावे. अतिशय उपयुक्त आहे. लंडनमध्ये इंग्लिश भाषेमुळे मुळात आपल्याला काही परके वाटतच नाही. त्यामुळे चुकायचे म्हटले तरी चुकू शकणार नाही. सर्वत्र नकाशे, दिशादर्शक फलक लावलेले असतात. शक्यतो कुणाला विचारायची वेळ येऊ नये, असेच सगळे नियोजन असते.

२. लंडन आय, मादाम तुस्साँ किंवा लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड अशा लोकप्रिय पर्यटनस्थळी प्रचंड गर्दी असते. त्यामुळे या ठिकाणी जायचे ऑनलाइन बुकिंग केल्यास फायदेशीर ठरते.

३. इकडे खासगी वाहने किंवा टॅक्सी महाग आहे. त्यामुळे सगळे जण अंडरग्राउंड ट्रेन किंवा बस वापरतात. इथल्या लाल डबल डेकर बस प्रसिद्ध आहेत. त्यातून जरूर फिरावे. अंडरग्राउंड ट्रेनमध्ये शहर दिसत नाही. बसमध्ये आयते शहरदर्शनही होते. बसला काही विशिष्ट टप्प्यांपर्यंत सरसकट १.७५ पौंड तिकीट आहे. बसमध्ये कायम पुढच्याच दाराने चढावे लागते. कंडक्टर नसतो. ड्रायव्हरसमोर मशिन असते, तिथे कार्ड टॅप करावे लागते. 

४. अंडरग्राउंड ट्रेन हे एक वेगळेच, प्रचंड विश्व आहे. याची सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. ती जरूर वाचावी. लंडनमधील भुयारी रेल्वे १८६३ मध्ये सुरू झाली आहे. अगदी अलीकडे नवी एलिझाबेथ लाइन सुरू झाली आहे.

५. हिथ्रो विमानतळावरून मध्यवर्ती शहरात येण्यासाठी हिथ्रो एक्स्प्रेस नावाची ट्रेन आहे. ती किंवा नवी एलिझाबेथ लाइन जरा महाग आहे. त्याऐवजी सरळ पिकॅडिली लाइन घेऊन शहरात यावे. ते स्वस्त पडते.

६. इकडे सार्वजनिक वाहनांत कुणीही कुणाच्या भानगडीत लक्ष घालत नाही. आपणही एखाद्या व्यक्तीकडे टक लावून पाहणे किंवा फोटो काढणे असभ्यपणाचे मानले जाते. ते टाळावे. (अनेकदा निग्रहाने तसे करावे लागते. पण तसेच करावे.)

७. रस्ता ओलांडताना ‘पादचारी प्रथम’ असा नियम इथे आहे. प्रत्येक चौकात रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नलचे बटण असते. ते दाबून वाट पाहावी. पादचाऱ्यांसाठीचा सिग्नल हिरवा झाल्यावर बिनधास्त रस्ता ओलांडावा. कितीही भरधाव गाडी, बस येत असेल तरी ती पांढऱ्या रेषेच्या आत थांबते म्हणजे थांबते. दोन गाड्यांमध्ये साधारणपणे आठ ते दहा फूट अंतर ठेवतात. बससाठी वेगळी लेन असते. बसवाले त्याच लेनमधून जातात. सायकलस्वार भरपूर आहेत. बसने त्यांना ओलांडू नये, अशी सूचना सर्वत्र बस ड्रायव्हरसाठी असते.

८. इथे भरपूर बागा आहेत. तिथं निवांत बसून तुम्ही काहीही खाऊ शकता, पिऊ शकता. जागोजागी डस्टबिन आहेत. त्यांचा वापर करावा लागतो.

९. इकडे सार्वजनिक स्वच्छतागृहे एकूण कमी दिसली. अंडरग्राउंड स्टेशन्सवर ती सोय नाही. त्यामुळे शक्यतो म्युझियम्स, हॉटेल आदी ठिकाणी मोकळे व्हावे व मगच मोठा प्रवास सुरू करावा.

१०. अंडरग्राउंडमध्ये अनेक ट्रेनमध्ये एसी नाही. जुन्या लाइन आहेत. व्हिक्टोरियासारख्या लाइनवर चक्क उकडते. इथले हवामान अत्यंत बेभरवशाचे आहे. त्यामुळे वॉटरप्रूफ शूज, जर्किन आणि छत्री जवळ बाळगणे आवश्यक ठरते.

----

लंडनवारीचे तपशीलवार वर्णन वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-----

19 Sept 2023

लंडनवारी - भाग १०

घरपरतीच्या वाटेवरती...
----------------------------


लंडन, गुरुवार, २४ ऑगस्ट २०२३.

बघता बघता आठ दिवस सरलेही आणि आमचा पुन्हा मायदेशी परतण्याचा दिवस येऊन ठेपला. चांगली स्वप्नं लवकर संपतात, असं म्हणतात. माझ्यासाठी लंडनमधले हे आठ दिवस अशाच सुंदर स्वप्नापेक्षा कमी नव्हते. आपलं रोजचं जगणं, भवताल, आपलं दैनंदिन चाकोरीबद्ध आयुष्य, घर, ऑफिस, नेहमीचा रस्ता, नेहमीची गाडी, नेहमीचा डबा, नेहमीचं बेड... हे सगळं आठ दिवस सोबत नव्हतं. यापूर्वी कधीही न पाहिलेल्या, कधीही न अनुभवलेल्या अशा - ७५०० किलोमीटर अंतरावरच्या - एका जगप्रसिद्ध अशा शहरात आम्ही वास्तव्य केलं होतं. जवळपास रोज पायाला भिंगरी लागल्यासारखं, उत्सुक नजरेनं ते सगळं बघितलं होतं. डोळ्यांत साठवलं होतं, मेंदूत नोंदवलं होतं, हृदयात जपलं होतं! 

आज, गुरुवारी रात्री ९.३० वाजता आमची परतीची फ्लाइट होती. येताना ‘इजिप्त एअर’ होती आणि कैरोला एक थांबा होता. जाताना मात्र मुद्दाम थेट जाणारी ‘एअर इंडिया’ची फ्लाइट बुक केली होती. घरी जाताना मध्ये कुठेही थांबायचा कंटाळा येतो आणि एकदा प्रवास सुरू झाला, की कधी घरी पोचतो असं होऊन जातं, हे मला अनुभवांती चांगलं माहिती होतं. प्रवासाचा दिवस म्हणून आम्ही या दिवशी कुठलाही नियोजित कार्यक्रम किंवा कुठेही भेट, फिरणं असं काही ठेवलं नव्हतं. सकाळी मोकळा वेळ होता, म्हणून आम्ही जवळच्या शॉपिंग मॉलमध्ये काही खरेदी करायला म्हणून बाहेर पडलो. या वेळी आम्ही बागेच्या उत्तर दिशेला गेलो. या भागात आम्ही आधी आलो नव्हतो. तिथं शेजारी शेजारी मोठे मॉल होते. शॉपिंग कॉम्प्लेक्सच होतं ते. मधोमध कार पार्किंगला मोकळी जागा होती. आम्ही आधी ‘पाउंडलँड’ नावाच्या दुकानात गेलो. पूर्वी आपल्याकडे ‘49 & 99’ अशी दुकानं असायची. त्यात बहुतेक वस्तू ४९ किंवा ९९ रुपयांना असायच्या. तसंच इथं होतं. इथं बहुतांश वस्तू एक पौंडाला मिळत होत्या. मग तिथं काही वस्तू घेतल्या. मग पुढं ‘सॅन्सबरीज’ हा मोठा मॉल होता, तिकडं गेलो. हे इथलं ‘डी-मार्ट’ म्हणायला हरकत नाही. कारण शहरात अनेक ठिकाणी याच्या शाखा बघितल्या. इथं दारात ट्रॉल्यांची जी लाइन होती, तिला कुलूप होतं. त्या ट्रॉलीच्या हँडलला एक नाणं सरकवायची खाच होती. तिथं एक पौंड टाकला, की ती कुलपासारखी साखळी निघते आणि मग ती ट्रॉली आपल्याला मिळते. परत जाताना ट्रॉली पुन्हा कुलूपबंद केली, की ती खाच उघडून आपला एक पौंड परत मिळतो. एका अर्थानं ते डिपॉझिट ठेवल्यासारखी व्यवस्था होती. मी असं आधी कुठं पाहिलं नव्हतं, म्हणून मला मजा वाटली.
मॉलमध्ये शिरताच मला सुरुवातीलाच एका शेल्फमध्ये रोजची वर्तमानपत्रं दिसली. टाइम्स, डेली मेल, डेली मिरर, डेली एक्स्प्रेस ही वृत्तपत्रं बघितली. इकडे आपल्यासारखी ब्रॉडशीट, म्हणजे मोठ्या आकाराची वृत्तपत्रं नाहीत. सगळी टॅब्लॉइड! मी गेल्या आठ दिवसांत रोजचा पेपर हाताळला नव्हता, त्यामुळं लगेच उत्सुकतेनं सगळे पेपर चाळले. भारताच्या चांद्रयानाच्या यशस्वी लँडिंगची बातमी सर्व वृत्तपत्रांनी चांगली दिली होती. आतील पानांत असली, तरी बहुतेकांनी पानभर वापरली होती. शीर्षकंही कौतुक करणारीच होती; अपवाद फक्त डेली एक्स्प्रेसचा! या वृत्तपत्रानं मात्र ‘चंद्रावर यान पाठविणाऱ्या या महासत्तेला यूके दर वर्षी अमुकतमुक मिलियन पौंडची मदत का करतोय?’ असं जरा खोचक शीर्षक दिलं होतं. ते अर्थात तिथल्या राज्यकर्त्यांना - विशेषत: आत्ताचे पंतप्रधान मूळ भारतीय वंशाचे आहेत हे लक्षात घेता - उद्देशून होतं, हे उघड होतं. मी ते पेपर वाचून तिथं ठेवून दिले आणि बाकी खरेदीकडं वळलो. इथली काही काही फळं वेगळी दिसली. केळी इथं पिकतच नाहीत, असं हर्षनं मागं सांगितलं होतं. इथं केळी येतात ती कोस्टारिकामधून. आलूबुखार, स्ट्रॉबेरी, संत्री, द्राक्षं ही फळंही आपल्यापेक्षा दिसायला थोडी वेगळी दिसतात. इकडे शेतमाल आयात करताना बरेच नियम, निर्बंध आहेत. त्याचा परिणाम असावा. पण इथल्या लोकांना त्यामुळं उत्तम दर्जाची फळं मिळतात, हे नक्की. आम्ही द्राक्षं घेतली होती, ती अगदी गोल आकाराची होती आणि भन्नाट चवीची होती. याच दालनाच्या पुढं द्राक्षांचं जन्मांतर असलेले द्रवही दिसले. आपल्याकडे ते असे उघड मॉलमध्ये विकायची टूम मध्येच निघते आणि परत विरून जाते. इकडे तसला काही पेच नसल्याने त्या विभागात जगभरातील उंची मद्ये सुखाने शेजारी शेजारी नांदत होती. मी उत्सुकतेने त्या भागात चक्कर टाकून आलो. तिथल्या वेगवेगळ्या वाइन, बीअर, व्हिस्की, रम, जीन आणि इतर ‘जी जी रं जी जी रं जी जी जी’ मंडळी आणि त्यातली व्हरायटी बघून थक्क झालो. जगात माणसानं काय ही मदहोश गोष्ट शोधून काढली आहे, असं वाटून गेलं. मी त्या चिंतनात बुडालेलो असतानाच कुटुंबाची हाक आली आणि मी पुन्हा भेंडी, बटाटा, वांगी आदी ‘मंडई’त शिरलो.

खरेदी झाल्यावर आता आपलं आपण बिल करायचं, यात आम्ही तयार झालो होतो. नीलला ते करण्याची क्रेझ होती. मग त्यानेच ते बिल केलं आणि आम्ही बाहेर पडलो. इथून चालत घरी पोचलो. आता बॅगा भरणे, काही वस्तू पुन्हा काढणे, परत भरणे असला कार्यक्रम सुरू झाला. सुदैवानं आम्हा दोघांनाही फार भरमसाठ सामान घेऊन फिरायची सवय नसल्याने आमच्या चार आटोपशीर आकाराच्या बॅगा पटकन भरून झाल्या. बॅगा भरणे हे माझं डिपार्टमेंट. त्यातल्या सर्व वस्तू नीट घडी घालून, कमीत कमी जागा व्यापतील, अशा पद्धतीने भरायला मला आवडतं. तर त्या बॅगाही भरून झाल्या. आम्ही संध्याकाळी साधारण पाच वाजता हर्ष-अनुजा आणि काका-काकूंचा निरोप घेऊन निघालो. काका-काकू पुढच्या आठवड्यात परत येणार होते. हर्ष आणि अनुजानं आज ‘वर्क फ्रॉम होम’ करायचं ठरवलं होतं. त्यामुळं ते आम्हाला सोडायला फिन्सबरी पार्क स्टेशनपर्यंत आले. इथं पुन्हा एकदा सेल्फ्यांची आवर्तनं झाली. आम्ही स्टेशनच्या आत जाऊन दिसेनासे होईपर्यंत काका आमचे फोटो काढत होते. आमचाही पाय नक्कीच जड झाला होता. मगाशी ‘सिटी मॅपर’वर हिथ्रो टर्मिनलकडे जाणाऱ्या ट्रेनच दिसत नव्हत्या. काही अडचण तर उद्भवली नाही ना, असं वाटलं. मात्र, तसं काही नव्हतं. स्टेशनवरून लगेच हिथ्रो टर्मिनल २ कडे जाणारी अंडरग्राउंड ट्रेन आली. आमचा आजचा या ट्रिपमधला तरी ‘अंडरग्राउंड’चा हा शेवटचा प्रवास होता. आमच्या मोठमोठ्या बॅगा दाराच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत ठेवल्याने मला उभ्यानेच प्रवास करावा लागला. सुमारे तासाभराचा हा प्रवास होता. आता आर्सेनल, हॉलोवे रोड, कॅलेडोनियन रोड, किंग्ज क्रॉस, रसेल स्क्वेअर, हॉलबर्न, कॉव्हेंट गार्डन, लिस्टर स्क्वेअर, पिकॅडिली सर्कस, ग्रीन पार्क, हाइड पार्क कॉर्नर, नाइटब्रिज, साउथ केन्सिंग्टन, ग्लॉसेस्टर रोड, अर्ल्स कोर्ट, बॅरन्स कोर्ट, ॲक्टन टाउन, ऑस्टरली, हन्सलो ईस्ट, हन्सलो सेंट्रल, हन्सलो वेस्ट ही स्टेशनं भराभर मागं पडत होती. आठ दिवसांच्या वास्तव्यात या स्टेशनांचा क्रम बऱ्यापैकी लक्षात राहिला होता. जवळपास तासा-सव्वा तासानंतर हिथ्रो टर्मिनल २ स्टेशन आलं. इथं उतरलो. बऱ्याच लिफ्ट, एस्कलेटर, ट्रॅव्हलेटर करत करत एकदाचे टर्मिनल २, अर्थात क्वीन्स टर्मिनलला पोचलो. इथं जाताना फार काही कटकट नसते. इमिग्रेशनमधून आम्ही झटपट आत आलो. 
आम्हाला फ्लाइटमध्ये जेवण असणार होतं; पण पाच वाजल्यापासून रात्री दहा-सव्वादहापर्यंत काय खाल, म्हणून हर्षनं आम्हाला पराठे पार्सल करून दिले होते. मला तर खरं भरून आलं होतं. एवढं कोण करतं हो! आणि खरं सांगतो. आम्हाला तिथं पोचेपर्यंत भूक लागलीच होती. मग आम्ही वर तिथे बसून ते पराठे खाल्ले आणि खरंच बरं वाटलं. हर्षचा हा निर्णय किती बरोबर होता, हे आम्हाला नंतर कळणारच होतं.
आता ‘एअर इंडिया’च्या खिडकीत जाऊन सामान ‘चेक-इन’ करणं हा प्रकार राहिला होता. तिकडं भली-मोठी लाइन होती. आम्ही तिथल्या किऑस्कमध्ये ऑनलाइन (वेब) चेक-इन केलं. तिथून आलेल्या त्या पट्ट्याही ताब्यात घेतल्या. तरीही आम्हाला त्या लाइनीत उभं राहावं लागलं. अखेर बरंच पुढं गेल्यावर तिथल्या माणसांनी ऑनलाइन ‘चेक-इन’ केलेल्यांना वेगळ्या व छोट्या रांगेत उभं केलं. अखेर एकदाच्या बॅगा त्यांच्या ताब्यात गेल्या आणि आम्ही जरा मोकळे झालो. इकडून आता सिक्युरिटी. ते काम तसं लवकर झालं. फक्त इकडे सिक्युरिटी चेकिंग करताना बेल्ट काढायला लावला आणि आडवं उभं राहून, विशिष्ट पद्धतीने दोन्ही हात वर करून उभं राहायला लावलं. अर्थात सगळ्यांनाच तसं ते करत होते, पण मला जरा ते एम्बॅरसिंग वाटलं. अर्थात इलाज नव्हता. पण ते सगळं झटपट संपवून ‘ड्युटी फ्री’त रेंगाळलो. खरं तर आम्ही संपूर्ण ट्रिपमध्ये खरेदीचा मोह कटाक्षाने टाळला होता. इकडे सगळं पौंडाच्या हिशेबात महाग, हा महत्त्वाचा मुद्दा तर होताच; शिवाय भारतात जे मिळतं त्याच वस्तू इकडे घेण्यापेक्षा फिरण्यासाठी, खाण्यासाठी, तिकिटांसाठी ते पैसे वापरावेत, असं आम्हाला वाटत होतं. ‘ड्युटी फ्री’मध्येही खरेदीचा मोह आवरला आणि पुढं निघालो. 

आमच्या फ्लाइटचा गेट नंबर ३९ होता, हे तिथल्या इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेवर कळलं. मग आम्ही तिकडं निघालो. तिकडं पोचायला चालत १० ते १५ मिनिटं लागतील, असंही तिथल्या फलकांवर लिहिलं होतं. ही सोय चांगली होती, मात्र त्यामुळं आमची पायपीट टळणार नव्हतीच. हा हिथ्रो विमानतळ एवढा अवाढव्य आहे, की बस! आम्ही पुन्हा अनेक लिफ्ट, एस्कलेटर, ट्रॅव्हलेटर अशी मजल-दरमजल करत त्या ३९ क्रमांकाच्या ‘एअर इंडिया’च्या गेटवर पोचलो. इकडे आपल्या लोकांची भरपूर गर्दी दिसली. खरं तर इथंच आपण भारतात असल्यासारखं वाटलं. ‘एअर इंडिया’च्या स्टाफमधले मराठी लोक एकमेकांत बोलताना ऐकू येत होतं. एकूण ‘मेरे देश की मिट्टी’चा सुगंध इकडेच यायला लागला होता. आमचं बोर्डिंग तसं वेळेत सुरू झालं आणि आम्ही विमानात जाऊनही बसलो. मात्र, आता खरी गंमत होती. आमच्या फ्लाइटला ‘टेक ऑफ’ करायला सिग्नलच मिळेना. बराच वेळ ते जागेवरच उभं होतं. हवाई सुंदऱ्यांनी लगबग करून लोकांना तेवढ्यात ती तसली पॅक्ड बिस्किटं वगैरे कोरडा खाऊ द्यायला सुरुवात केली. मात्र, लोकांची अस्वस्थता वाढत होती. अखेर पायलटने जाहीर केलं, की युरोपच्या आकाशात विमानांची प्रचंड गर्दी झाली असल्यानं आपल्याला उडायला परवानगी नाही. साधारण ११ वाजता आपण उड्डाण करू शकू. झालं! आता इथंच दीड तास बसणं आलं. अशा वेळी समोर चालणारा स्क्रीन व त्यावर एखादा सिनेमा बघणं ही करमणूक त्यातल्या त्यात घडू शकते. मात्र, आमच्या तिघांचेही समोरचे स्क्रीन धड नव्हते. एकही सुरू नव्हता. माझा तर शेवटपर्यंत झाला नाही. त्या सुंदरीला सांगून झालं. तिनं एकदा तिकडं जाऊन ती सिस्टीम रिसेटही केली. मात्र, स्क्रीन सुरू होण्यापलीकडे काहीही झालं नाही. मला बाकी काही नाही; पण तो ‘पाथ मोड’ तरी बघायचाच असतो. पण ते काही नशिबात नव्हतं. ‘एअर इंडिया’ आता ‘टाटां’कडं आली असली, तरी सेवा सुधारणेला अजून भरपूरच वाव आहे, असं वाटलं. प्रचंड कंटाळ्यानंतर अखेर ११ वाजून पाच मिनिटांनी ते विमान एकदाचं हललं. त्या प्रचंड विमानतळावर आमची ‘टॅक्सी’च १५ मिनिटं चालली. अखेर साडेअकराच्या सुमारास आमच्या त्या ‘बोइंग’नं अवकाशात झेप घेतली आणि आम्ही हुश्श केलं. खाली लंडन हिऱ्या-माणकांसारखं लखलखत होतं. मनातल्या मनात पुन्हा एकदा लंडनला ‘बाय बाय’ केलं. थोड्याच वेळात ढगांत खालचं दृश्य दिसेनासं झालं. आता रात्रही झाली होती. उशीर झाल्यानं हवाई सुंदरींनी भराभर जेवण आणून दिलं. इकडे ‘खान-पान’ व्यवस्था बरी होती. म्हणजे ‘पान’ बरं होतं; ‘खान’ ठीकठाकच होतं. एकूण पनीर हा प्रकार एवढ्या विविध तऱ्हेने तुमच्यावर मारला जातो की काही विचारू नका. काही पदार्थांबाबत केवळ ‘अतिपरिचया’ने ‘अवज्ञा’ होते, त्यातला हा एक! 

२५ ऑगस्ट २३, मुंबई

असो. आता ही फ्लाइट नॉनस्टॉप असल्यानं थेट मुंबईतच उतरायचं होतं. निर्धारित वेळ सकाळी ११ ची होती. मात्र, निघायलाच उशीर झाल्याने आता ही तास-सव्वा तास उशिरा पोचणार हे गृहीत धरलंच होतं. माझा ‘पाथ मोड’ बंद असल्याने विमान नक्की कुठे आहे, हे काही कळतच नव्हतं. आता सकाळचा नाश्ता, चहाही देण्यात आला होता. खिडकीतून अरबी समुद्र तरी दिसेल असं वाटत होतं. मात्र, ढगांची दाट चादर होती. ती हटली, तरी खाली काळपट असंच काही तरी दिसायचं. आता तो समुद्र आहे की ढगच आहेत हे काही कळत नव्हतं. शेवटी मी तो नाद सोडला. थोड्याच वेळात ‘डिसेंडिंग’ सुरू होणार, अशी घोषणा झाली. मुंबईत पहिल्या फटक्यात कधी विमान उतरत नाही, हे माहिती होतंच. मग दोन फेऱ्या झाल्या. मागे येऊन परत महाराष्ट्राच्या मुख्य भूमीवर आलो. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्या दिसायला लागल्या. अखेर ‘एटीसी’कडून ग्रीन सिग्नल मिळाला असावा. विमान झपाट्यानं खाली येऊ लागलं. खाडी ओलांडली आणि थोड्याच वेळात ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा’च्या एकुलत्या एक रन-वेला आमच्या विमानाची चाकं लागली. मनातल्या मनात ‘गणपतीबाप्पा मोरया’चा गजर केला. 
विमानातून टर्मिनलला आलो. विमानातच घोषणा झाली होती, की बॅगा ५ नंबरला येतील. आम्ही आपले त्या पट्ट्यापाशी जाऊन थांबलो. आमची आन्हिकंही उरकली. तरी त्या पट्ट्यावर काही हालचाल दिसेना. मग नीललाच शंका आली, म्हणून दहा नंबरच्या पट्ट्यापाशी गेलो. तिथं बॅगा येत होत्या. क्षणात आपण भारतात आल्याची जाणीव झाली. थोड्या वेळानं आलेल्या बॅगा गुपचूप उचलल्या. इकडे ‘ग्रीन चॅनेल’ला पहिल्यांदाच एक अधिकारी आडवा आला. कुठून आलात, बॅगेत काय वगैरे किरकोळ विचारल्यासारखं करून त्यानं (बहुदा आमच्या चेहऱ्यांकडं बघून) जाऊ दिलं. आम्ही जाताना जी कॅब पुण्यातून केली होती, त्यांनाच बोलावलं होतं. अखेर दीड वाजता आमची व त्यांची भेट झाली. फूड मॉलला एक ब्रेक घेऊन आम्ही जवळपास पाच -सव्वापाचला अखेर सुखरूप घरी पोचलो... लंडन ट्रिपचं स्वप्न अशा रीतीनं सुफळ संपूर्ण झालं होतं... मन समाधानानं शिगोशीग भरलं होतं...! 


-----------------------------

उपसंहार...

नंतरचे दोन दिवस आमची सुट्टीच होती. जेटलॅग थोडासा जाणवला. सकाळी उशिरा उठलो. जवळपास दहाच्या पुढं... मग लक्षात आलं, आत्ता लंडनला साडेपाच वाजले असतील पहाटेचे! आम्हाला तिकडं साधारण साडेपाच-सहालाच जाग यायची. मात्र, दोन दिवस संपले आणि सोमवारपासून म्हणजे २८ ऑगस्टपासून ऑफिसला जायला लागलो. सुरुवातीचे काही दिवस लंडनला खरोखरच ‘मिस’ केलं. मग तिथं काढलेले फोटो, व्हिडिओ पुन:पुन्हा पाहिले. अंडरग्राउंड ट्रेनचे व्हिडिओ यू-ट्यूबवर बघितले. काका-काकू अजून तिकडंच असल्याने ते तिकडचे फोटो आमच्या ग्रुपवर टाकायचे आणि ‘आम्ही तुम्हाला मिस करतोय,’ असं लिहायचे. त्यामुळं तर हे आणखीनच जाणवायचं. मग फेसबुकवर एक ‘लंडन फोटोग्राफी क्लब’ नावाचा ग्रुप सापडला. तो जॉइन केला आणि तिथं फोटो टाकायला सुरुवात केली. संपूर्ण लंडन ट्रिपमध्ये सोशल मीडियावर एकही फोटो टाकायचा नाही, हे बंधन मी स्वत:वर घालून घेतलं होतं आणि ते परत येईपर्यंत पाळलं. आल्यावर शनिवारी सकाळी पहिल्या दिवसाचे, म्हणजे जातानाचे फोटो टाकले. त्यात ‘जाऊन आलो,’ असं स्पष्ट लिहिलेलं असूनही अनेकांना आम्ही त्याच दिवशी तिकडं गेलो आहोत, असं वाटलं, तो भाग निराळा! मग पुढचे काही दिवस रोजचे फोटो एकेका दिवशी आणि मग ३० ऑगस्टला ब्लॉगचा पहिला भाग लिहिला तेव्हा मलाच हुश्श वाटलं. हे लिखाण म्हणजे माझ्या स्वत:च्या आनंदासाठी केलेलं लिखाण आहे. अर्थात ते मी सोशल मीडियावर शेअर करतोच. त्यातून जे वाचतील ते वाचतील. मला स्वत:ला आणखी दहा-वीस वर्षांनी एवढे तपशील लक्षात राहणार नाहीत, म्हणून हे अगदी बारीक-सारीक वर्णन टिपून लिहून ठेवण्याचा घाट! शिवाय पुन्हा कधी जाणं होतंय, नाही होत कुणाला माहिती! अनेक गोष्टी करायच्या, बघायच्या राहिल्या हे तर उघडच आहे. मात्र, जे काही बघितलं तेही आयुष्यभर लक्षात राहील आणि त्या स्मृती आनंद देत राहतील, हे नक्की.
दोन दिवसांनंतर बाहेर पडलो, तर तिकडच्या सवयीप्रमाणे (झेब्रा क्रॉसिंगवरूनच) बिनधास्त रस्ता ओलांडायला लागलो, तर एक दुचाकीवाला जोरात आला आणि माझ्याकडे भयंकर लूक (‘दोन मिनिटं थांबता येत नाही का, ***’) देऊन पुढं निघून गेला. मी लंडनच्या नव्हे, तर पुण्याच्या रस्त्यावर आहे हे मग माझ्या डोक्यात आलं. 
नंतर मी एकदा दुचाकी घेऊन निघालो होतो. आमच्या घराजवळच एक शाळा आहे. तिथं मोठं झेब्रा क्रॉसिंग आहे. तिथून एक बाई लहान मुलाची प्रॅम घेऊन रस्ता ओलांडण्यासाठी पुढं येत होत्या, पुन्हा थांबत होत्या. मी आपोआप माझी बाइक हळू केली. मग मागून येणारी एक कारही स्लो झाली. त्यांना ते लक्षात आलं. त्यांनी झटकन रस्ता ओलांडला. जाताना माझ्याकडे पाहून एक स्मितहास्य केलं...
अवघी लंडनवारी इथं सुफळ झाली!!


(विशेष उल्लेख - शीर्षक प्रेरणा : शान्ता शेळके यांची कविता... कौशल इनामदार यांनी फार सुरेख चाल दिली आहे या कवितेला!) 


(समाप्त)

-------------------

लंडन प्रवास मार्गदर्शिका वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

------