1 Dec 2023

हंपी डायरी - भाग २

विठ्ठल ते विरुपाक्ष...
------------------------


विठ्ठल मंदिराच्या त्या प्रांगणात आम्ही प्रवेश करताक्षणीच एक जाणवलं, की आपण एका वेगळ्या दुनियेत आलो आहोत. खरं तर समोर पर्यटकांची गर्दी होती. रविवार होता, त्यामुळे भरपूर लोक आले होते. तरीही एकदम ते सगळं चित्र धूसर होऊन समोरच्या पाषाणांतून, तिथल्या खांबांतून, कमानींतून, भिंतींतून जुना वैभवशाली काळ असा समोर येऊन ठाकलाय, असं काहीसं वाटायला लागलं. (फार सिनेमे बघितल्याचा परिणाम असावा.) खरं तर ते मंदिर खूप भव्य, प्रचंड मोठं किवा उत्तुंग असं काहीच नाही. एकच मजल्याएवढ्या उंचीचं सर्व काम. समोरच्या बाजूला एक गोपुर होतं, तेच काय तेवढं दोन-तीन मजल्यांएवढं उंच. बाकी सर्व बांधकाम साधारण दहा ते पंधरा मीटरपेक्षा उंच नसावं, तरीही त्या प्रांगणात फिरताना काही तरी भव्य-दिव्य असं आपण बघत आहोत, असं वाटत होतं. कर्नाटकात गेल्यावर तिथली लिपी आपल्याला येत नसल्याचा त्रास फार होतो. इथं विठ्ठल मंदिरातही त्या काळाशी जोडणारा लिपीसारखा एखादा धागा उणाच होता. त्याची काहीशी सलही वाटत होती. तिथल्या प्रत्येक खांबाने, त्या खांबावरच्या शिल्पाने, त्यातून न समजणाऱ्या एखाद्या आकृतीने आपल्याशी भरभरून बोलावं, असं फार वाटत होतं. मात्र, लिपी समजत नसल्यास वाचता न येण्यामुळं जी चीडचीड होते, तीच थोडीशी आधी इथं व्हायला लागली... पण काही क्षणच! नंतर ते भग्न सौंदर्य माझ्याशी लिपीपलीकडची भाषा बोलू लागलं. ती भाषा होती वास्तुशास्त्राची, प्रमाणबद्धतेची, सौष्ठवाची, कमालीच्या परिश्रमांची आणि शिल्पांतून आकार घेणाऱ्या अद्वितीय सौंदर्याची! मग माझं मन हळूहळू शांत व्हायला लागलं. आपोआप समोरचं लख्ख दिसू लागलं.
सर्वांचं लक्ष या मंदिरासमोर असलेल्या त्या सुप्रसिद्ध रथाकडं होतं. आम्हीही आधी तिथं धाव घेतली. आपल्याकडच्या पन्नासच्या नोटेवर या रथाचं चित्र छापलेलं आहे. त्यामुळं अनेक लोक हातात एक नोट घेऊन समोरच्या त्या रथाचा फोटो घेत होते. आम्ही गेलो तेव्हा स्वच्छ ऊन होतं. ती सर्व पाषाणवास्तू त्यामुळं झळाळून उठली होती. फोटो अप्रतिम येत होते. सोबतच्या पुस्तकात माहिती वाचून, आम्ही एकेक ठिकाण बघत होतो. मुख्य रथाचं वर्णन या पुस्तकातही सविस्तर दिलंं आहे. या रथासमोर दोन हत्ती आहेत. मात्र, ते नंतर तिथं आणून ठेवले असावेत. मूळ शिल्पात तिथं घोडे असावेत. त्या घोड्यांच्या शेपटीचा काही भाग मुख्य रथाला जोडलेला दिसतोही. शिवाय हत्ती त्या रथाच्या प्रमाणात मोठे नाहीत. प्रमाणबद्धता हे त्या शिल्पांचं वैशिष्ट्य असताना तिथं अशी चूक होणं शक्यच नाही. पण ते काही का असेना, सध्या ते दोन छोटेसे हत्तीच तो रथ ओढताहेत, असं दिसतं. रथाची चाकं आणि वरच्या बाजूची कलाकुसर केवळ अप्रतिम आहे. आम्ही सर्व बाजूंनी फिरून हा रथ पाहिला. भरपूर फोटो काढले. या रथासमोर मुख्य विठ्ठल मंदिर आहे. तिथे आता चौथऱ्यावर ‘रिस्टोरेशन’चे काम सुरू आहे. त्यामुळे तिथं एक सिक्युरिटी गार्ड बसला होता आणि तो कुणालाही वर येऊ देत नव्हता. या मुख्य मंदिराच्या मंडपात जे स्तंभ आहेत, त्यावर वाजवलं तर वेगवेगळे ध्वनी उमटत. आपल्या लोकांनी ते खांब वाजवून वाजवून, त्यावर जोराने आघात करून खराब करून टाकले आहेत, असं समजलं. त्यामुळंच आता तिथं वर चढायला बंदी आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्ती नाही. आपल्या पंढरपूरला असलेली विठ्ठलाची मूर्ती मुस्लिम आक्रमकांपासून वाचविण्यासाठी काही काळ इथं आणून ठेवली होती असं सांगतात. (किंवा उलटही असेल.) ‘कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू’  हे तिथून आलं असणार. महाराष्ट्र आणि कर्नाटकला घट्ट बांधून ठेवणारा हा विठ्ठल नावाचा धागा अतूट आहे, एवढं मात्र खरं. 
विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात आणखी तीन सभामंडप होते. तेही बघितले. प्रत्येक ठिकाणी सेल्फीबाजांची गर्दी होती. आम्हीही जवळपास तेच करत होतो. इथल्या मंडपांत व्यालप्रतिमा बऱ्याच दिसतात. व्याल म्हणजे एक काल्पनिक प्राणी. त्याचं धड एका प्राण्याचं आणि शिर एका प्राण्याचं, कान किंवा शेपटी आणखीन तिसऱ्याच प्राण्याची असते. अशा व्यालांच्या बऱ्याच प्रतिमा तिथं आहेत. मुख्य सभामंडपात जाता येत नसलं, तरी मागच्या बाजूनं गाभाऱ्याच्या पुढच्या बाजूला जाता येतं. आम्ही तिकडं वळलो. तिथं एक चाफ्याचं सुरेख झाड होतं. तिथं बऱ्याच जणांचं फोटोसेशन सुरू होतं. तिथला एक गाइड हिंदीत त्याच्याबरोबरच्या लोकांना ‘सोनाली कुलकर्णीसोबत मी हंपी नावाच्या मराठी सिनेमात काम केलंय,’ असं सांगत होता. मलाही २०१७ चा प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘हंपी’ सिनेमा आठवला. त्यात (धाकट्या) सोनालीसह ललित प्रभाकरनं सुंदर काम केलंय. मी ब्लॉगवर तेव्हा त्याचं परीक्षणही लिहिलं होतं. ‘डोण्ट वरी, बी हंपी’ असं त्याचं शीर्षक होतं. त्यात प्रियदर्शन जाधवनं साकारलेला गाइड कम रिक्षावाला असं म्हणत असतो. माझ्याही ते बरेच दिवस डोक्यात राहिलं होतं. त्या गाइडच्या बोलण्यामुळं एवढं सगळं आठवलं. (परत आल्यावर आवर्जून ‘हंपी’ पुन्हा बघितला. त्यात ‘हंपी’ अप्रतिम टिपलंय यात वाद नाही.)
असो.
आम्ही मागच्या बाजूनं त्या गाभाऱ्याच्या पुढं असलेल्या भागात गेलो. थोडं खाली उतरून गर्भगृहाला प्रदक्षिणाही घालता येत होती. आत अंधार होता. अनेकांनी मोबाइलचे फ्लॅशलाइट सुरू केले होते. या प्रदक्षिणा मार्गावर हत्ती आणि घोड्याची व्याल टाइप प्रतिमा असल्याचा उल्लेख आशुतोष बापट यांच्या पुस्तकात होता. मी ती प्रतिमा शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मला काही ती दिसली नाही. प्रदक्षिणा मार्गावरून बाहेर आलो. इतर सभामंडप बघितले. सर्वत्र किती फोटो काढू आणि किती नको, असं होत होतं. शेवटी अगदी थकायला झालं. तिथंच एका सभामंडपात आम्ही टेकलो. रविवारमुळं गर्दीचे लोंढेच्या लोंढे येत होते. आम्हाला अजून बरंच काही बघायचं होतं. मग आम्ही बाहेर पडलो. परत जाण्यासाठीही त्या बॅटरी गाड्यांसाठी मोठी रांग होती. अखेर साधारण अर्ध्या तासानं आमचा नंबर लागला आणि आम्ही मुख्य गेटकडं परतलो. मंजूबाबाला फोन केला. तो लगेच आला. आता आम्हाला भूक लागली होती. मग तो आम्हाला कमलापुरात एक ‘काली रेस्टॉरंट’ नावाचं हॉटेल होतं, तिथं घेऊन गेला. हे पहिल्या मजल्यावर होतं आणि तिथंही भरपूर गर्दी होती. दोनशे रुपये असा एकच दर होता आणि ‘अनलिमिटेड बुफे’ होतं. मग आम्ही पैसे देऊन कुपन घेतलं आणि केळीचं पान असलेली ताटं धरली. भूक लागली होती कडाडून, त्यामुळं ती केळीची भाजी, रस्सम, नंतर भात-आमटी असं सगळं भरपूर हाणलं. इथला पापड मस्त होता. त्यामुळं जो तो तो पापड मागत होता आणि ते पटापट संपत होते. टेबलांवर जागा नव्हती. कुणीही कुठंही बसत होतं. आम्हाला ते जरा अवघडच गेलं, पण भुकेपुढं काय होय! शेवटी ‘उदरभरण’ झालं आणि आम्ही पुढं निघालो. आता आम्हाला मंजूबाबा ‘क्वीन्स बाथ’, कमलमहल आणि गजशाला हे तीन स्पॉट दाखवायला घेऊन गेला. ‘रानी का स्नानगृह’ असो, की कमल महल... तिथल्या राण्याच हे स्नानगृह किंवा तो महाल वापरत होत्या की अन्य कारणांसाठी त्यांचा वापर केला जात होता, याविषयी ठोस माहिती नाही, असं तिथल्या फलकांवर स्पष्टपणे नमूद केलं होतं. अर्थात जे सर्वमान्य नाव आहे, तेच तिथंही लिहिलं होतं. त्या स्नानगृहात पाणी सोडण्याची यंत्रणा मात्र भन्नाट होती. दगडी पाटांतून पाणी खेळवलं होतं. अर्थात सध्या ते पूर्ण कोरडं होतं. इथल्या वास्तुरचनेवर इस्लामिक प्रभावही आहे. त्यामुळं हे काम नक्की विजयनगरच्या काळात झालं असावं, की नंतर त्यात मॉडिफिकेशन झालं असावं, असा प्रश्न आहे. नंतर आम्ही कमलमहाल बघायला गेलो. इथं आत जाऊ देत नाहीत. मात्र, बाहेरूनच तो महाल अप्रतिम सुंदर दिसतो. तो अजूनही चांगला राहिला आहे, हे महत्त्वाचं. इथंच ‘हंपी’तलं सोनालीचं नृत्य चित्रित करण्यात आलं आहे. हा महाल आकाशातून कमळाच्या पाकळ्यांसारखा दिसतो म्हणे. (आम्ही अनेक ठिकाणी या वास्तूंचं ड्रोनद्वारे चित्रीकरण सुरू असल्याचं नंतर पाहिलं.)
इथून पुढं आम्ही गजशाळा बघायला गेलो. कमलमहालाच्या शेजारीच ही वास्तू आहे. सलग आडव्या बांधलेल्या या इमारतीत अकरा कमानी आहेत. प्रत्येक कमानीत एकेक हत्ती मावू शकेल, अशी जागा आहे. मागल्या बाजूने माहुताला ये-जा करण्यासाठी छोटा दरवाजा आहे. शेजारीच आणखी एक इमारत आहे. ती सुरक्षारक्षकांची असावी, असा अंदाज आहे. काटकोनात असलेल्या या दोन इमारतींच्या समोर सुंदर हिरवळ होती. आम्ही तिथं जरा टेकलो. मी तर आडवाच झालो. फार बरं वाटत होतं. बरीच पायपीट झाली होती. पण आता संध्याकाळ होत आली होती. त्यामुळं हवाही आल्हाददायक होत चालली होती. इथून आम्ही ‘महानवमी डिब्बा’ (खरं तर ते तिब्बा असावं...) बघायला गेलो. हे एक भव्य प्रांगण आहे. इथं समोर एक उंच मंचासारखा चौथरा आहे. इथं राजे-रजवाडे मंडळी बसून समोर सांस्कृतिक कार्यक्रम बघत असायची म्हणे. समोर मात्र सर्वत्र सपाट नव्हतं. एके काळी खोलगट आखाड्यासारखं काही तरी होतं. तिथं प्राण्यांच्या झुंजी चालत असतील का, असा विचार आला. समोर एके ठिकाणी तळघर होतं. तिथंही आम्ही आत फिरून आलो. खजिना ठेवायची जागा असणार, असं वाटलं. त्या जागेच्या शेजारी एक अतिशय सुंदर दगडी बारव आहे. हिचं उत्खनन अगदी अलीकडे,म्हणजे १९८८ मध्ये झालंय. त्यामुळंच ती खूपच चांगल्या स्थितीत दिसली. 

इथून पुढं आम्हाला खरं तर हजारीराम आणि भूमिगत शिवमंदिरही बघायचं होतं. मात्र, विरुपाक्ष मंदिर हे मुख्य आकर्षण सूर्यास्ताच्या आत बघायला हवं होतं. त्यामुळं मंजूबाबानं आमचा कार्यक्रम बदलून ही दोन ठिकाणं उद्या करू या असं सांगितलं आणि रिक्षा विरुपाक्ष मंदिराकडं घेतली. हंपीचा तो प्रसिद्ध चढ चढून आल्यावर त्यानं आधी डावीकडं रिक्षा घेतली. इथंच ती लक्ष्मी-नृसिंहाची भव्य मूर्ती आहे. आम्ही उतरलो. त्या मूर्तीसमोर बऱ्यापैकी गर्दी होती. या मूर्तीच्या मांडीवर लक्ष्मीची मूर्ती होती. मात्र, ती आक्रमकांनी तोडली. आता केवळ नरसिंह आहे. त्याच्या पायाला आता ‘योगपट्ट’ बांधला आहे. या नरसिंहाचे सुळे, डोळे एवढे हुबेहूब आहेत, की ते बघताना जरा भीतीच वाटते. म्हणून याला ‘उग्र नरसिंह’ असेही म्हणतात. याच्या शेजारी ‘बडीव लिंग’ आहे. एकच अखंड शिळेतून कोरलेलं हे भव्य शिवलिंग असून, भोवती पाणी आहे. नरसिंह आणि हे शिवलिंग या दोन्ही ठिकाणी समोर ग्रिलचे दरवाजे लावून जवळ जाण्यास बंदी करण्यात आली आहे. एका अर्थाने ते योग्यच आहे. याचे कारण आपल्याकडच्या पर्यटकांना कसलंही भान नसतं. फोटो काढण्याच्या नादात आपण त्या मूर्तीची झीज करतो आहोत, हेही अनेकांच्या लक्षात येत नाही. असो. आता आम्हाला मुख्य विरुपाक्ष मंदिरात जायचं होतं. पुन्हा एकदा तो चढ चढून गेल्यावर एकदम विरुपाक्ष मंदिराचं उंच गोपुर दिसलं. सभोवती भरपूर मोकळी जागा, पार्किंगसाठीची जागा अनेक गाड्यांनी व्यापलेली, शेजारी छोटे विक्रेते, पलीकडे तर एक लहानसा बाजारच, मंदिरासमोर मोठा रस्ता हे सर्व वातावरण त्या ठिकाणाचं स्थानमाहात्म्य दाखवीत होतं. एका अर्थानं हे त्या सर्व परिसराचं ‘राजधानी स्थळ’ होतं म्हणायला हरकत नाही. आता उन्हं अगदी कलायला आली होती. मंदिराच्या दारात, पण थोडंसं दूर मंजूनं आम्हाला सोडलं. तिथून आम्ही त्या भव्य गोपुराकडं बघत चालत निघालो. आत पोचल्यावर पुन्हा एक भव्य प्रांगण होतं. तिथं अनेक भाविकांची वर्दळ होती. आम्हीही फोटो काढले. इथं मात्र गाइड घ्यावा, असं वाटू लागलं. समोरच एक जण आला. त्याच्यासोबत असलेल्या लोकांना ‘बाय’ करतच होता, तेव्हाच आम्ही त्याला विचारलं. ‘श्रीनिवास’ असं त्याचं नाव होतं. पाचशे रुपयांत यायला तो तयार झाला. एका अर्थानं आम्ही गाइड घेतला, ते बरंच झालं. कारण त्यानं आम्हाला भरपूर आणि चांगली माहिती दिली. 
मंदिराच्या समोर असलेल्या गोपुरापासून ते इथल्या विरुपाक्षाच्या मूर्तीपर्यंत सर्व माहिती श्रीनिवासने अत्यंत तन्मयतेनं दिली. त्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा होती. मंदिराच्या आत आणखी एक लहान प्रांगण होतं. तिथं ते पाच स्तंभ होते आणि सभोवती स्थानिक महिला नटून-थटून, साडीत, गजरे माळून आल्या होत्या आणि सुंदर रांगोळ्या रेखाटून तिथं दिव्यांची आरास मांडत होत्या. आम्ही फारच भाग्यवान होतो. तिथं शेजारीच मंदिरातील प्रसिद्ध हत्तीण लक्ष्मी दिसली. तिला सोंडेत पैसे दिले की ती सोंड डोक्यावर ठेवून आशीर्वाद देते. आमच्यापैकी वृषालीला ते करायचा भलताच उत्साह होता. मात्र, सुरुवातीला तिथं मुलांची गर्दी होती. त्यामुळं आपण मंदिर पाहून आल्यावर ‘लक्ष्मी’कडे जाऊ या, असं श्रीनिवास म्हणाला. आम्ही श्रीनिवाससोबत ते मंदिर फिरून पाहिलं. विरुपाक्षाची भव्य मूर्ती, मागच्या बाजूला असलेल्या पंपादेवी, भुवनेश्वरीदेवी यांच्या मूर्ती हे सगळं बघितलं. पंपादेवी म्हणजेच पार्वती. मग गाइडनं ती रती व मदनाची (मन्मथ) कथा पुन्हा सांगितली. विरुपाक्ष इथे कसे आले, हे सांगितलं. आपल्या प्रत्येक मंदिराला, प्रत्येक ऐतिहासिक स्थळाला हे असं लोककथांचं, पुराणकथांचं सुंदर कोंदण असतंच. त्या भागातल्या सर्व लोकांची या कथांवर नितांत श्रद्धाही असते. प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधणाऱ्या मंडळींना या मंडळींच्या श्रद्धेमागचा भाव कळणं कठीण आहे. मला स्वत:ला त्या कथांपेक्षाही ती सांगणाऱ्या माणसाच्या नजरेतला श्रद्धाभाव आवडतो. त्या भावनेचा आदर करावासा वाटतो. 

नंतर श्रीनिवासनंं आम्हाला मंदिराच्या मागं नेऊन ते ‘पिन होल कॅमेरा’ तंत्रानं इथल्या गोपुराची आत कशी सावली पडते, ते दाखवलं. तेव्हाच्या वास्तुशास्त्रातील प्रगती बघून आपण केवळ थक्क होतो. नंतर तो आम्हाला मंदिराच्या उत्तर दिशेच्या दरवाजातून बाहेर घेऊन गेला. इथं शेजारी बारवेच्या आकाराचं चांगलं बांधलेलं तळं आहे. तुंगभद्रा नदीतील पाणी या तळ्यात आणण्याची सोय केलेली आहे. तिथंही अनेक लहान-मोठी देवळं होती. पुन्हा आत आलो, तो एका ताईंनी येऊन सर्वांना हातावर दहीभाताचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. आणखी एक बाई आल्या आणि त्यांनी लेमन राइसचा प्रसाद दिला. त्या वेळी भूक लागलेली असताना केवळ दोनच घासांचा तो प्रसाद इतका सुंदर लागला म्हणून सांगू! आम्ही तसं त्यांना सांगितल्यावर त्या पण अशा काही खूश झाल्या, की बस्स! श्रीनिवास आता आम्हाला बाहेरच्या प्रांगणात घेऊन गेला. इथं आता लक्ष्मी हत्तिणीचं दर्शन घ्यायचं होतं. वृषालीनं एक नोट तिच्या सोंडेत दिली आणि श्रीनिवासनं सांगितल्याप्रमाणे ती पटकन तिच्याकडं पाठ करून वळली. त्याबरोबर ‘लक्ष्मी’नं सराईतासारखी तिच्या डोक्यावर सोंड ठेवून तिला आशीर्वाद दिला. ही हत्तीण या कामात चांगलीच प्रशिक्षित करण्यात आली आहे. पैसे दिले तरच ती सोंड डोक्यावर ठेवते. बाकी केळी किंवा अन्य काही दिलं तर नुसतंच खाते. एकूण मजेशीर प्रकार होता. बाहेर आल्यावर तिथल्या तीन तोंडांच्या नंदीचेही आम्ही फोटो काढले. त्याचीही काही तरी कथा होतीच. मी आता विसरलो. नंतर एकदम बाहेरच्या प्रांगणात आलो. तिथं अनेक लोक पथारी टाकून झोपायच्या तयारीत आलेले दिसले. श्रीनिवासनं सांगितलं, की या प्रांगणात लोक राहायला येतात. पहाटे नदीत स्नान करतात आणि ओलेत्याने विरुपाक्षाचे दर्शन घेऊन आपापल्या घरी जातात. शिवाय या प्रांगणात अनेक लग्नेही होतात. इथं श्रीनिवासनं आमच्या मोबाइल कॅमेऱ्यातील एका सुविधेचा फायदा घेऊन धनश्रीचा व माझा असा फोटो काढला, की माझ्या दोन्ही बाजूंनी ती उभी राहिलेली दिसेल. साई व वृषालीचा तसाच फोटो काढला. आम्ही खूप हसलो. एकूण श्रीनिवास हा फारच पटाईत आणि उत्तम गाइड होता, यात काही शंका उरली नाही. आम्ही आनंदानं त्याला पाचशे रुपये दिले व विरुपाक्षाला पुन्हा एक नमस्कार करून बाहेर पडलो. आम्ही फारच चांगल्या दिवशी आलो होतो. समोर त्रिपुरारी पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आकाशात लखलखत होता. खाली त्या गोपुरावरचा पिवळाधम्मक दिवाही तसाच दीप्तीमान होऊन झळकत होता. वातावरणात सुखद गारवा होता. आमच्या दिवसभराच्या सर्व श्रमांचा परिहार झाला होता. तिथं शेजारी छोटं मार्केट होतं. तिथं चक्कर मारली. चहा घेतला. मंजूबाबानं आता आम्हाला हॉटेलवर सोडलं तेव्हा सात वाजत आले होते...
हंपीतला पहिला दिवस विठ्ठल ते विरुपाक्ष असा संस्मरणीय झाला होता. ‘पाषाणांतले देव’ आम्हाला पावले होते...  तिकडं त्रिपुरी पौर्णिमेच्या प्रकाशात ती मंदिरं न्हाऊन निघाली होती आणि त्यांच्या दर्शनानं इकडं आमची मनंही!

(क्रमश:)

----
पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

------


2 comments: