17 Jul 2024

एक सदर - एक प्रयोग, दोन लेख

एक सदर - एक प्रयोग, दोन लेख
---------------------------------------

विशेष नोंद - 

‘मटा’मध्ये दोन वर्षांपूर्वी संपादकीय पानावर ‘जाता जाता’ हे सदर ‘चकोर’ या टोपणनावाने प्रसिद्ध होत असे. वेगवेगळे संपादकीय सहकारी ते लिहीत असत. मीही अनेकदा ते लिहिले आहे. खाली दिलेला पहिला भाग मी आमच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केल्यानंतर काही मैत्रिणींनी गमतीत अशी तक्रार केली, की ही तर एकच (म्हणजे पुरुषांची) बाजू आहे. आम्ही लिहू का आमची बाजू? त्यावर मीही गमतीनं म्हटलं, की तुम्ही कशाला? मीच लिहितो. मग मी त्या ग्रुपपुरता एक मजकूर लिहिला आणि तिकडं शेअर केला. त्यात सदराचं नाव ‘येता येता’ असं ठेवलं आणि लिहिणारीचं नाव ‘चकोरी’ झालं. त्यालाही चांगला प्रतिसाद म्हणाला. स्त्रीच्या भूमिकेतून आपण तसा विचार करू शकतो का, याची ही एक चाचणी होती. हा परकाया प्रवेश अवघड असला, तरी अशक्य नव्हता. आता दोन वर्षांनंतर मला वाटलं, की ही गंमत अधिक जास्त वाचकांपर्यंत पोचावी, म्हणून दोन्ही लेख इथं ब्लॉगवर प्रकाशित करतोय. आधी मूळ सदरातील लेख, नंतर त्याला ग्रुपपुरतं दिलेलं उत्तर... एंजॉय...

-------------


जाता जाता
--------------

एक आदिम साहसी खेळ
-----------------------------------

साहसी खेळांच्या यादीत लग्नाचाही समावेश करावा, अशी मागणी कधी एकदा होतेय याचीच आम्ही वाट बघत होतो. एक दीर्घानुभवी पती असल्यानं आम्ही स्वत: ही मागणी करणं शक्यच नव्हतं, हे चाणाक्ष (अन् अनुभवी) वाचकांच्या लक्षात आलंच असेल. अखेर व्हॉट्सअप मेसेजेस स्क्रोल करता करता ‘तो’ मेसेज दिसला अन् गुदगुल्या झाल्या. ‘लग्नालाही साहसी खेळ’ म्हणून मान्यता द्या, अशी अतिसाहसी मागणी त्या कथित विनोदी संदेशात होती. आम्हाला मात्र ही मागणी विनोदी आहे, असं म्हणवत नाही. लग्न हा साहसी खेळच आहे, यात शंका नसावी. या खेळाची वैशिष्ट्यं अगणित आहेत. जगातील बहुसंख्य लोक आयुष्यात किमान एकदा तरी हा खेळ खेळतात. या खेळात जोडीदार बदलण्याची संधी नसते. निवडण्याची जरूर असते; मात्र एकदा निवडला, की त्या जोडीदारासोबतच पुढं आयुष्यभर हा खेळ खेळावा लागतो. बहुतेकांना खूप लहानपणापासून या खेळासाठी तयार केलं जातं. घरी पालकांचा ओरडा आणि शाळेत शिक्षकांचा दणका यांतून आपण या खेळासाठी टणक होत जातो. आपल्या अंगी अधिक सोशिकता यावी, यासाठी परीक्षणादी उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. या खेळात भाग घेण्यापूर्वी काही गोष्टींची पूर्तता करणं अगदी गरजेचं असतं. दर महिना काही विशिष्ट रकमेच्या दमड्या कमावणं आणि किमान चार खोल्यांचा फ्लॅट असणं, या त्या बेसिक अटी होत. या अटी पूर्ण होईपर्यंतच खेळाडूंचं निम्मं अवसान गळालेलं असतं. मात्र, अशा खेळाडूचे पालक जोशात असतात. ते कोंबड्यांची झुंज लावावी, त्याप्रमाणे आपल्या अपत्याला या साहसी खेळात भाग घ्यायला उतरवतातच. एक मन नको म्हणत असतं; मात्र काही ‘बेसिक इन्स्टिंक्ट’ना बळी पडून खेळाडू अखेर या खेळाच्या मैदानात उतरतोच. खेळाडू एकदा तयार झाला, की लाखो रुपये खर्च करून मोठा सोहळा आयोजित केला जातो. देवा-ब्राह्मणांच्या आणि (किरकोळ आहेराच्या बदल्यात) फुकटचं जेवण झोडायला आलेल्या गावभरच्या पाहुण्यांच्या साक्षीनं खेळाडू आपल्या जोडीदाराबरोबर गळ्यात हार घालून घेतो. खेळाच्या सुरुवातीलाच त्याच्या वाट्याला ‘हार’ नावाचा हा प्रकार येतो, तो पुढं आयुष्यभर कायम राहणार असतो. बहुतेक (पुरुष) खेळाडू त्या वेळी बावळट असल्यानं, त्यांना याची काहीही कल्पना नसते. लाखो रुपये खर्च करूनही ते वेड्यासारखे हसत फोटो काढून घेत असतात. (पुढं आयुष्यभर या प्रसंगाचे हृदयद्रावक फोटो बघून त्यांना रडायचंच असतं.) अनेक पुरुष खेळाडूंचा हा बावळटपणा पुढं अनेक वर्षं टिकतो. काही गडी मात्र स्मार्ट असतात. ते पहिल्यापासून आपण बावळट किंवा येडछाप असल्याचं सोंग घेतात आणि ते आयुष्यभर निभावतात. हे सोंग एकदा जमलं, तर या साहसी खेळात त्यांना पुढं बऱ्यापैकी गंमत येऊ लागते. तसे या खेळाचे नियम अगदी सोपे असतात. आपल्या पत्नी नामक जोडीदारासमोर कायम नतमस्तक होऊन राहणं आणि तिनं काहीही विचारलं, की वरपासून खालपर्यंत मुंडी हलवणं ही एक शारीरिक क्रिया करणं, एवढं केलं की खेळ जमतोच. आयुष्यभर माणसाला ‘होय होय’ करायला लावणारा एवढा सकारात्मक खेळ दुसरा नसेल. अशा या खेळाप्रति आणि खेळाडूंप्रति समाजानं कायम सहानुभूती बाळगली पाहिजे.

- चकोर

(मटा, २३-८-२०२२)

---

येता येता...

---------------

साहसे ‘श्री.’ प्रतिवसति...
---
-------------------------------

साहसी खेळांच्या यादीत लग्नाचाही समावेश करावा, अशी मागणी कधी एकदा होतेय याचीच मी वाट बघत होते. एक दीर्घानुभवी बायको असल्यानं आपणच ही मागणी करावी, असं कालपास्नं सारखं वाटत होतं. पण मेल्या भिशी ग्रुपच्या वस्साप गप्पांतून सवड ती कशी होईना! अखेर आमच्या शाळेच्या ग्रुपवर ‘तो’ मेसेज पडलाच. खुदुखुदू हसू लागले. ‘लग्नालाही साहसी खेळ म्हणून मान्यता द्या,’ अशी मागणी त्या कथित विनोदी संदेशात करण्यात आली होती. मला मात्र ही मागणी विनोदी आहे, असं काही म्हणवत नाही. लग्न हा साहसी खेळच आहे, यात शंका नसावी. माझंच बघा. चांगली डिग्री होईपर्यंत सुखात होते. आई-बाबांच्या लाडाकोडात वाढत होते. ते घरी आणि कॉलेजमधले गोंडाघोळू मित्र बाहेर काही कमी पडू देत नव्हते. कॉलेजात तर ‘चकोरी कॉलेजक्वीन’ असं कुणी कुणी नालायक लिहूनही ठेवायचं भिंतीवर... तेव्हा ‘किशन कन्हैया’तलं ‘चंदा पे चकोरी क्यूं हो हो हो होती है कुरबान’ हे गाणं फेमस होतं. त्या दंताळ्या गण्यानं मला फिशपॉंड टाकला होता त्यावरून! नंतर चप्पल दाखवलीन् त्याला... असे सुखाचे दिवस चालले होते. पण आई-बाबांना हे सुख बघवेना. माझा मंगळ कडक असावा बहुतेक. पोरीनं लव्ह मॅरेज करावं, म्हणून आईनं सगळे देव पाण्यात घातले होते. पण त्यात मदनदेव नसावा. शिवाय तिला दासबोधाचं वेड! मग कसलं होतंय आमचं लव्हमॅरेज? झालं. ते ‘चहा-पोहे’ नावाचं महाबंडल प्रकरण आयुष्यात आलं. काय एकेक नग आले होते देवा... दर वेळी आमच्याकडच्या रोहिणीमावशीनं केलेले पोहे मी त्या पोरट्यासमोर नेऊन आदळायची आणि ते येडं ‘छान चव आहे तुमच्या हाताला’ म्हणत कोमट हसायचं. मी इकडं इतकी फुटायचे! सावरून घेता घेता आईची पुरेवाट व्हायची. अखेर आईचा त्रागा बघवेवना आणि बाबांच्या सिग्रेटी वाढत चालल्या तसा मी एक ‘चि. श्याम’ पसंत करून टाकला. धुमधडाक्यात लग्न लागलं. हे पहिलं साहस! हनीमूनला प्रथेप्रमाणे गोव्याला गेलो. आमचा चि. श्याम खरोखर ‘चि. श्याम’ होता, हे मला पहिल्याच रात्री कळलं. तेव्हापासून आमच्या संसाराच्या ड्रायव्हिंग व्हीलवर मीच बसल्ये आहे. हे दुसरं साहस! आज १२ वर्षं झाली. श्यामरावांना हनीमूनमधली गंमत लवकरच कळली आणि आमच्या संसारवेलीवर ‘बकुळ’ फुलली. मला मुलगीच हवी होती. आमच्या ‘ललिता पवारां’ना आम्हाला अजून पोरगं व्हायला हवं होतं म्हणे. आता याला दु:साहस म्हणायचं नाही तर काय! मी बरी खमकी होते आणि ‘ललिताबाईं’ना लवकरच बाप्पानं तिकडं बोलावून घेतलं आणि आम्ही सुटलो. तेव्हापासून किराणा यादीपासून लाइट बिलापर्यंत आणि इस्त्रीच्या कपड्यांपासून ते बकुळच्या डब्यापर्यंत मीच सगळा गाडा ओढत्ये आहे. श्यामराव भिडस्त असले तरी कधी मूडमध्ये आले, की घरातल्या घरात मला ऑर्डरी सोडतात. एका कामाला हात म्हणून लावत नाहीत. त्यांच्या गादीला मी राजगादी म्हणते. श्यामरावांना त्यातही एक कोमट आनंद होतो. बाकी त्यांना एकूण ‘हे’ कमीच. एवढी दमले, तरी बाबा कधी अर्धा कप चहा विचारणार नाही. मलाही अपेक्षा नाहीच म्हणा! एकूण आमचा संसार हॉट नसला, तरी ‘कोमट’ तरी आहे. बाकी मैत्रिणींच्या संसाराचे काय धिंडवडे निघालेत ते आमच्या ‘टवाळ टवळ्या’ ग्रुपवर कळतंच. मी आपलं ध्यान पदरी पडलं पवित्र झालं म्हणत्ये आणि बकुळच्या (आगामी) संसाराची चित्रं रंगवत बसते. बकुळनं तरी प्रेमविवाह करावा अशी माझी इच्छा आहे. मी सगळ्या इच्छा मारत मारत जगले, तसं तिचं होऊ नये. थोडक्यात, बाईमाणसाची आयुष्यभर सत्त्वपरीक्षा पाहणारा हा साहसी खेळ नाही, असं कोण म्हणेल? या साहसातच आमचे ‘श्री’ वस्ती करून राहताहेत ना! ‘साहसे श्री प्रतिवसति’ ही संस्कृत म्हण तिथूनच आली असली पाहिजे. ते काही का असेना, मला वाटतं, की या खेळाप्रति आणि माझ्यासारख्या सोशिक खेळाडूंप्रति समाजाने कायम सहानुभूती बाळगली पाहिजे.

- चकोरी

---

30 Jun 2024

टी-२० वर्ल्ड कप विशेष लेख

वो ‘फॅमिलीवाला फीलिंग’...
---------------------------------

भारतीय संघाच्या विजयानंतरच्या जल्लोषात एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे प्रत्येक सदस्याचे एकमेकांशी असलेले घट्ट बंध. याला कारण अर्थातच कुटुंबप्रमुख राहुल द्रविड... अशी काय जादू केली द्रविड मास्तरांनी?


शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास सगळा देश जल्लोषात बुडून गेला होता. भारताने तब्बल ११ वर्षांनी आयसीसी क्रिकेट ट्रॉफी जिंकली होती. बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हलवर हार्दिक पंड्याच्या शेवटच्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेने एक धाव काढली आणि भारताचा सात धावांनी विजय निश्चित झाला. कुठलीही मोठी स्पर्धा जिंकली, की खेळाडूंच्या आनंदाला पारावार उरत नाही. प्रत्येक जण आपापल्या शैलीत तो साजरा करतो. मात्र, शनिवारी रात्रीचा भारतीय संघाचा जल्लोष काही वेगळाच भासला. तो अधिक भावनिक, अधिक सच्चा, अधिक संतुलित व म्हणून अधिक प्रगल्भ वाटला.
भारताला विजय मिळाल्याबरोबर कर्णधार रोहित शर्माने स्वत:ला मैदानात झोकून दिलं. हार्दिकही खाली बसला. पॅव्हेलियनमधील सपोर्ट स्टाफ आणि इतर राखीव खेळाडू मैदानात धावत निघाले. प्रत्येक जण अतीव आनंदानं न्हाऊन निघाला होता. सगळे जण एकमेकांना मिठ्या मारत होते, रडत होते, नाचत होते. एरवी कधीही भावनांचं प्रदर्शन न करणारा राहुल द्रविडही भावोत्कट झाला. महंमद सिराजला तर अश्रू आवरत नव्हते. विराटने त्याच्या कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधला. त्यात तो त्याच्या लहान मुलीशी गप्पा मारताना दिसला. रोहितने भावपूर्ण पद्धतीने मैदानातील मातीची चव घेतली. अतीव कष्टाने मिळालेल्या विजयाची चव कशी असते, हेच जणू तो पाहत होता!
संघाला करंडक प्रदान करताना रोहित ऐटबाज पद्धतीने पावले टाकत आला आणि मोठ्या जल्लोषात त्याने तो करंडक स्वीकारला. नंतर संघाने केलेला आनंदोत्सव अभूतपूर्व होता. रोहित आणि विराट या दोघांवर सर्वांचं लक्ष होतं. भारताचा तिरंगा अंगावर लपेटून या दोघांनी सर्व मैदानाला फेरी मारली. प्रशिक्षक राहुल द्रविडला ते विसरले नाहीत. सर्व खेळाडूंनी मिळून राहुलला हवेत उचललं आणि आपली कृतज्ञता व्यक्त केली. संघातले सगळे खेळाडू एकमेकांना घट्ट आलिंगन देत होते आणि अश्रू ढाळत होते. रोहित त्याच्या मुलीला खांद्यावर घेऊन सगळीकडं मिरवत होता. हार्दिक पंड्यानं अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि गेल्या तीन-चार महिन्यांत त्याच्याविरुद्ध जे ट्रोलिंग झालं, त्याविषयी सूचक बोलून मन मोकळं केलं. प्रत्येक जण एकमेकांचं कौतुक करत होता. या सगळ्यांतून या सर्व खेळाडूंमधले घट्ट बंध सहज दिसून येत होते.
हे चित्र एका दिवसात तयार झालेलं नाही. यामागे ‘राहुल द्रविड फॅक्टर’ आहे. राहुल द्रविड कसा आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पटकन स्वत:कडे श्रेय न घेणारा, संयमी, शांत, अतिशय निगर्वी, कुटुंबवत्सल, साधा आणि अभ्यासू अशी त्याची प्रतिमा आपल्या मनात आहे. राहुल जसा आहे तसंच कालचं आपल्या संघाचं वर्तन होतं. दहा-बारा वर्षांपूर्वीचे रोहित आणि विराट आठवून बघा. त्यातही विराट. ‘दिल्ली का गुंडा’ अशीच त्याची प्रतिमा होती. तिथपासून ते कालच्या कुटुंबवत्सल, जबाबदार, प्रेमळ पित्यापर्यंतचा त्याचा हा प्रवास कौतुकास्पद आहे. त्याची पत्नी अनुष्का अनेकदा विनाकारण ट्रोल होते. मात्र, आपल्याला बदलवण्यात तिचा मोठा वाटा आहे, हे विराटनं अनेकदा जाहीरपणे कबूल केलं आहे. विराट आता मुंबईत राहतो, हेही लक्षणीय आहे. रोहितचा स्वभावही वेगळ्या धर्तीवर आक्रमक आहे. मात्र, काल त्याने संयमितपणे प्रदर्शित केलेल्या भावना त्याच्यातील प्रगल्भ माणूस दाखवून गेल्या. वास्तविक, गेल्या काही वर्षांत भारतीय संघाला आयसीसी स्पर्धांमध्ये उपांत्य किंवा अंतिम फेरीत सातत्याने अपयश येत गेलेलं आहे. त्यामुळं कालच्या अंतिम फेरीत विजय हवाच होता. रोहित, विराट आणि राहुल या तिघांसाठीही तो मिळायला हवा होता. तसा तो मिळाल्यानंतर तिघांचंही वर्तन मात्र अतिशय वाखाखण्याजोगं, स्तुत्य होतं. सगळं काही मिळवून झाल्यानंतर जी तृप्तीची, समाधानाची भावना येते, तिचं प्रतिबिंब या तिघांच्या देहबोलीत दिसलं. त्यातूनच रोहित आणि विराटनं आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांतून निवृत्तीची घोषणा केली. राहुलचाही प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ कालच संपुष्टात आला. यशाचं उत्तुंग शिखर गाठल्यानंतर तिघांनीही अतिशय समाधानानं आपली जबाबदारी सोडली.
रोहित काय, विराट काय... यांचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आगमन ते कालचा त्यांच्या करिअरमधला महत्त्वाचा टप्पा हा प्रवास आपल्यापैकी अनेकांनी आपल्या डोळ्यांदेखत पाहिला आहे. आज वयानं ४० पेक्षा अधिक असलेल्या सर्व क्रिकेट रसिकांना हे सर्व खेळाडू अगदी आताआतापर्यंत ‘नवी पोरं’ वाटत होती. आरडाओरडा करणे, अॅटिट्यूड दाखवणे, शिव्या देणे, आक्रमक हावभाव करणे, चिडणे अशी तरुणाईची सर्व व्यवच्छेदक लक्षणं घेऊन ते वावरत होते. काल मात्र त्यांचं रूपांतर जबाबदारीनं वागणाऱ्या, संयम दाखवणाऱ्या, गप्प राहून टीका झेलणाऱ्या, आपल्या कुटुंबावर खूप खूप प्रेम करणाऱ्या, सहकाऱ्यांवर जीव लावणाऱ्या ‘बाप्या’ माणसांत झालेलं बघितलं. हे पाहून ‘सगळं नीट मार्गी लागलं बाबा’ टाइप जे एक तृप्त समाधान वाटतं ना, ती भावना अनेक रसिकांसाठी प्रबळ ठरली. आपण या पोरांचं रूपांतर ‘कम्प्लीट मॅन’मध्ये झालेलं बघितलं. हे सगळं ‘राहुल द्रविड फॅक्टर’मुळं घडलं, यात शंका नाही.
भारतात आपल्याला असं आवडतं. कुटुंबात सगळे मार्गी लागले पाहिजेत, असा आपला आग्रह असतो. त्यासाठी कुटुंबप्रमुख आपल्या जीवाचं रान करत असतो. त्याच्या या प्रयत्नांचं मोल कुटुंबातल्या सदस्यांना कळलं, तर ते कुटुंब सुखी व समाधानी होतं. कालच्या भारतीय संघात अशाच एका कुटुंबाचं दर्शन घडलं. राहुल अर्थातच कुटुंबप्रमुख होता. त्याच्या तिथं असण्याने या कुटुंबातले हार्दिकसारखे एरवी ‘टगे’ असणारे मेंबरही बदलले. आपल्या अश्रूंचं, भावनांचं प्रदर्शन करणं ही फार वाईट गोष्ट नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. करंडक मिळाल्यानंतर मैदानातील खेळाडूंपासून ते सपोर्ट स्टाफपर्यंत प्रत्येक सदस्याला ‘हा आपला विजय आहे,’ असं वाटणं हीच मोठी गोष्ट होती.
जेव्हा कुठल्याही व्यक्तिमत्त्वात आक्रमकता आणि संयम यांचा असा देखणा मिलाफ होतो, तेव्हा सर्वोच्च स्थान गाठणं फार अवघड उरत नाही. या संघानं हे ‘फॅमिलीवालं फीलिंग’ आपल्याला दिलं आहे. त्यामुळंच होणारा आनंद जरा काकणभर जास्त आहे!

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; १ जुलै २०२४)

----

11 Jun 2024

पु. ल. स्मृती लेख

पु. ल. गेले तो दिवस...
--------------------------


१२ जून २०००. माझ्या आयुष्यात मी हा दिवस कधीही विसरू शकणार नाही. ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व’ पु. ल. देशपांडे या दिवशी हे ऐहिक जग सोडून गेले. माझ्या पिढीतील इतर अनेकांप्रमाणे माझाही पिंड पु. लं.च्या साहित्यावर पोसला गेला आहे. पु. लं.चं व्यक्तिमत्त्वच एवढं मोठं होतं, की त्यांनी विसाव्या शतकातील मराठी साहित्यविश्वावर अमीट असा ठसा उमटवला आहे. एखाद्या साहित्यिकावर एवढं मन:पूत प्रेम करणारा महाराष्ट्र तेव्हा अनुभवता आला, हे माझं भाग्य. 
मी आज सांगणार आहे, ती पु. ल. गेले त्या दिवसाची आठवण. त्याआधी थोडी पार्श्वभूमीही सांगायला हवी. मी तेव्हा ‘सकाळ’मध्ये उपसंपादक म्हणून काम करत होतो. मला तिथं काम करायला सुरुवात करून जेमतेम अडीच-तीन वर्षं होत होती. विजय कुवळेकर साहेब तेव्हा संपादक होते. पु. ल. त्या काळात अर्थात अतिशय थकले होते. ‘एक होता विदूषक’ हा त्यांनी पटकथा-संवाद लिहिलेला चित्रपट एक जानेवारी १९९२ रोजी प्रदर्शित झाला. हे त्यांचं बहुतेक अखेरचं मोठं काम. त्यानंतर पु. लं.नी पार्किन्सन्समुळं सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतल्यासारखीच होती. त्यांचं दर्शन दुर्मीळ झालं होतं. मात्र, तरीही ‘ते आहेत’ ही भावनाच पुरेशी होती. मला पु.लं.ना प्रत्यक्ष कधीच बघता आलं नाही. मी त्यांना सदेह बघितलं ते थेट ‘प्रयाग’मध्ये ते शेवटच्या आजारपणात दाखल झाले तेव्हाच! अर्थात त्यांना कधी भेटलो नसलो, तरी माझ्याकडं त्यांची एक सोडून चार चार पत्रं होती. हा फार मोठा अनमोल ठेवाच ठरला आहे आता माझ्यासाठी. शिवाय मी पॉलिटेक्निकमध्ये शिकत असताना सार्वजनिक फोनवरून एकदा त्यांच्याशी फोनवर बोललो होतो. (त्याबाबत मी यापूर्वी ब्लॉगवर लिहिलेलं असल्यानं ते अनुभव आता इथं तपशिलात लिहीत नाही.) मात्र, त्यांना प्रत्यक्ष बघण्याचा योग काही आला नाही. आला तो असा - रुग्णालयातील बेडवर विकल अवस्थेत झोपलेल्या आणि नाकातोंडात नळ्या अशा स्थितीत... तेव्हा मनाला केवढ्या यातना झाल्या असतील याचा आता विचारही करवत नाही.
पु. ल. सार्वजनिक जीवनात तेव्हा फारसे सक्रिय नसले, तरी तेव्हा सत्तेवर आलेल्या युती सरकारने पहिला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार पुलंना देण्याची घोषणा केली. त्या कार्यक्रमाला दाढी वाढलेले पु. ल. व सुनीताबाई दोघेही उपस्थित होते. पु. लं. ना भाषण करता येण्यासारखी परिस्थिती नव्हती, म्हणून सुनीताबाईंनी त्यांचं भाषण वाचून दाखवलं. त्यात सत्ताधाऱ्यांच्या ‘ठोकशाही’वर टीका असल्यानं नंतर एकच गदारोळ झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘झक मारली आणि पुलंना पुरस्कार दिला’ असे उद्गार काढले. ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रात ‘मोडका पूल’ अशा शीर्षकानं एक व्यंगचित्रही प्रसिद्ध झालं. मात्र, पु. ल. व सुनीताबाई यांनी त्यांच्या स्वभावानुसार, नंतर या विषयाबद्दल एक अक्षरही काढलं नाही. नंतर वातावरण निवळल्यावर शिवसेनाप्रमुख पुलंना भेटायला पुण्याला त्यांच्या घरी आले. पु. ल. हे बाळासाहेबांचे एके काळचे शिक्षक. त्यामुळे खुर्चीवर बसलेल्या पु. लं.च्या पायावर डोके ठेवून त्यांनी नमस्कार केला. हा क्षण आमचे तेव्हाचे फोटोग्राफर मिलिंद वाडेकर यांनी नेमका टिपला. शिवसेनाप्रमुख म्हणाले, की माझ्या गाडीत कायम पु. लं.च्या कॅसेट असतात आणि मी कायमच त्या ऐकत असतो वगैरे.
या काळात पु. ल. पुन्हा माध्यमांत चर्चेत आले असले, तरी नंतर मात्र त्यांचं आजारपण बळावलं. पु. लं.नी ८ नोव्हेंबर १९९९ रोजी वयाची ऐंशी वर्षं पूर्ण केली, तेव्हा पुण्यात ‘आशय’ने मोठा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला होता. माझ्या माहितीनुसार, त्यांच्या पुलोत्सवाची ती सुरुवात होती. अर्थात पु. ल. स्वत: यापैकी कुठल्याच कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. जूनच्या सुरुवातीला पु. लं.ची तब्येत बरीच खालावली आणि त्यांना डेक्कन जिमखान्यावरील प्रयाग यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. या वेळचं त्यांचं आजारपण गंभीर असल्याचं समजल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पु. लं.च्या चाहत्यांचा जीव खाली-वर होऊ लागला. पु. लं.ची प्रचंड लोकप्रियता पाहता, त्यांच्या तब्येतीबाबतची प्रत्येक बातमी अतिशय महत्त्वाची होती. तेव्हा वृत्तवाहिन्या नुकत्याच सुरू झाल्या होत्या. मराठीत तर पूर्ण वेळ वृत्तवाहिनी एकही नव्हती. तेव्हा वृत्तपत्रांची जबाबदारी सर्वाधिक होती. त्यातही पुण्यात ‘सकाळ’मध्ये त्यांच्या प्रकृतीची इत्थंभूत माहिती येणं अगदी आवश्यकच होतं. 
तेव्हा आम्ही काही जण ऑफिसमधली रात्रपाळी संपली, की ‘प्रयाग’ला एक चक्कर मारायला लागलो. प्रयाग हॉस्पिटलतर्फे रोज पु. लं.च्या तब्येतीची माहिती देणारं एक बुलेटिन जारी केलं जात असे. मात्र, ते दिवसा आणि संध्याकाळी असे. रात्री-बेरात्री काही झालं तर आपल्याला कसं कळणार, असं सगळ्याच पेपरमधल्या पत्रकारांना वाटायचं. तेव्हा बरेच पत्रकार काम संपलं, की मंडईत जमायचे. त्याऐवजी आता ते ‘प्रयाग’समोर जमू लागले. रात्री तीन किंवा क्वचितप्रसंगी साडेतीन-चारपर्यंत काहीही अघटित घडल्याचं समजलं, तरी प्रत्येक वृत्तपत्र ही बातमी लगेचच देण्यासाठी तत्पर होतं. त्यासाठीच सगळे तिथं एकत्र थांबायचे. पु. लं.च्या प्रकृतीतील चढ-उतार जवळपास आठवडा किंवा त्याहून अधिक काळ सुरू होते. एकदा यातली एक बातमी ‘सकाळ’मध्ये चुकली. त्या वेळी संपादक कुवळेकर साहेब स्वाभाविकच चिडले आणि त्यांनी ‘प्रयाग’बाहेर बातमीदारांची रीतसर २४ तास ड्युटीच सुरू केली. मी डेस्कवर काम करत असलो, तरी पु. लं.विषयीच्या आत्यंतिक जिव्हाळ्यामुळं मीही रोज रात्री तिथं जाऊन थांबत असे. मुकेश माचकर यांची आणि माझी ओळख तिथंच झाली. पु. लं.च्या कुटुंबीयांच्या वतीनं डॉ. जब्बार पटेल यांनी माध्यमांना सर्व माहिती देण्याची जबाबदारी घेतली होती. दहा की अकरा जून रोजी तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख पु. लं.ची प्रकृती पाहायला येणार असल्याचं कळलं, तेव्हाच आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. विलासरावांच्या आगे-मागे बाळासाहेब ठाकरेही येऊन गेले. इतर नेत्यांची रीघ लागली, तसं आमची शंका बळावत चालली. पु. ल. जायच्या आदल्या दिवशी रात्री दीड-दोनच्या सुमारास आम्ही ‘प्रयाग’च्या मागल्या बाजूला जमलो होतो. तिथून शेजारच्या खोलीतील पु. ल. स्पष्ट दिसत होते. माझं लक्ष वारंवार त्यांच्याकडं जात होतं आणि मी निग्रहानं दुसरीकडं मान वळवत होतो. डॉ. पटेल आणि आम्ही काही लोक तिथं बोलत असताना, पलीकडंच सुनीताबाई शांत चित्तानं डोळे मिटून एका खुर्चीवर बसल्या होत्या. तेवढ्यात एका सरकारी माध्यमात काम करणाऱ्या, जरा आगाऊ अशा वरिष्ठ पदावरच्या बाईंनी एकदम जब्बारना विचारलं, ‘अहो डॉक्टर, भाई पद्मभूषण होते की पद्मविभूषण? नाही म्हणजे उद्या लागेल ना आम्हाला ते सगळं...’
त्यांच्या या उद्गारानंतर आम्ही सगळे अवाक झालो. डॉक्टर त्या बाईंवर भडकलेच. सुनीताबाई अगदी जवळ होत्या. त्यांनी हे बोलणं ऐकलं असेल का, या विचारानं आमच्या सगळ्यांचाच थरकाप उडाला. आम्ही सगळे तिथून दूर निघून बाहेर रस्त्यावर आलो. आम्ही इतर पत्रकार त्या बाईंच्या या उद्गारावर चिडलो होतो. मात्र, एकीकडं आता सगळं संपत चाललं आहे, याची एक विषण्ण जाणीवही झालीच. मी तिथून घरी जायला निघालो. पु. लं.चं मला झालेलं ते शेवटचं दर्शन...
दुसऱ्या दिवशी १२ जून. सकाळपासूनच पु. लं.च्या प्रकृतीविषयी उलटसुलट ऐकायला मिळत होतं. ‘प्रयाग’ने आदल्या दिवशीच बुलेटिन काढून ‘व्हेरी क्रिटिकल’ असं सांगितलंच होतं. पु. लं.चे लाडके भाचे डॉ. दिनेश ठाकूर व कुटुंबीय अमेरिकेतून येणार होते. ते आल्यानंतरच कदाचित बातमी जाहीर होणार होती. पु. लं.ना शेवटच्या क्षणांत कुठलाही त्रास होऊ नये, यावर सुनीताबाईंचा कटाक्ष होता. अति उपचार किंवा त्यांच्या शरीरावर नसते प्रयोग करू नयेत, असं त्यांनी डॉक्टरांना सांगितलं होतं. अखेर दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी ती नकोनकोशी बातमी आलीच. ‘आपल्या लाडक्या पु. लं.नी शांतपणे हे जग सोडलं,’ असं डॉ. शिरीष प्रयाग यांनी हॉस्पिटलसमोर जमलेल्या गर्दीला सांगितलं. बातमी अपेक्षित असली, तरी मनात कल्लोळ उठला. डोळे पाण्यानं भरले. ज्या माणसानं आपल्याला एवढा आनंद दिला, एवढं हसवलं, जगणं शिकवलं तो आता शरीरानं आपल्यात नाही, ही भावनाच फार फार त्रासदायक होती. अर्थात, पत्रकारांना अशा वेळी भावनेला आवर घालून कामं करावी लागतात. मी लगेच ऑफिसला गेलो. पु. लं.संदर्भातल्या बातम्या, संदर्भ अशा गोष्टींना मदत करत राहिलो. कृत्रिमपणे सगळं काम करत राहिलो... संध्याकाळी ऑफिसमधून सुटल्यावर मात्र बांध आवरता आला नाही. तिथून माझ्या रूमवर जाईपर्यंत मनसोक्त रडून घेतलं. आपल्या जगण्याचा एक मोठा हिस्सा एकदम नाहीसा झाल्याची जाणीव झाली होती.
दुसऱ्या दिवशी उठल्यावर सगळे पेपर वाचले. ‘मटा’नं तर संपूर्ण अंकच पुलमय केला होता. मी तेव्हा ‘सकाळ’मध्ये असलो आणि ‘सकाळ’नेही उत्तम कव्हरेज केलं असलं, तरी मला ‘मटा’चा अंक अतिशय आवडला. विशेषत: ‘मटा’चा अग्रलेख अप्रतिम होता. ‘आपले आनंदगाणे संपले’ असं (की असंच काहीसं) त्याचं शीर्षक होतं. तो अग्रलेख वाचायला सुरुवात केल्यानंतर तीन-चार वाक्यांनंतरच माझ्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागलं. हा अग्रलेख कुमार केतकर यांनी लिहिला होता, हे नंतर कळलं. (याच्या दुसऱ्याच दिवशी केतकरांनी सुनीताबाईंना उद्देशून आणखी एक मोठा अग्रलेख लिहिला होता. तोही अतिशय वाचनीय होता.)
माझ्या आठवणीनुसार, पुलंवर दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ जून रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी त्यांचं पार्थिव सर्वसामान्य रसिकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. (ते कुठं ठेवलं होतं, हे मला आता आठवत नाही. बहुतेक ‘मालती-माधव’मध्ये असावं...) मी तिथं जाऊन त्यांचं अखेरचं दर्शन घेऊन आलो. ‘वैकुंठ’ला मात्र मी गेलो नाही. ते सगळं मी टीव्हीवर पाहिलं. 
पु. ल. गेले त्याला आज दोन तपं पूर्ण होतील. पु. ल. शरीरानं गेले असले, तरी ते आपल्यात आहेतच. त्यांनी एवढं लिहून ठेवलं आहे आणि ते बहुतेकांना आता एवढं पाठ आहे, की पुस्तक उघडायचीही गरज पडत नाही. पु. ल. इतर साहित्यिकांच्या मानानं आणखी सुदैवी, याचं कारण दृकश्राव्य माध्यमाचं महत्त्व त्यांना खूप आधी कळलं होतं. त्यामुळं पुलंचे व्हिडिओ, त्यांचं अभिवाचन, त्यांची नाटकं हे सगळं आज इंटरनेटवर उपलब्ध आहे. पुलंवर फेसबुकवर अनेक पेजेस आहेत. त्यात हजारो लोक रोज त्यांच्या आठवणी जागवत असतात. अगदी ‘इन्स्टाग्राम’वरही पु. ल. आहेत. त्यांच्या गाजलेल्या वाक्यावाक्यांचे रील्स आहेत. मुंबईत रवींद्र नाट्य मंदिरात पु. ल. देशपांडे अकादमी आहे आणि तिथं समोर त्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. पुण्यात सिंहगड रोडवर अतिशय सुंदर अशा जपानी उद्यानाला पु. ल. देशपांडे उद्यान असं नाव देण्यात आलं आहे. त्या उद्यानाबाहेर फूटपाथवर पु. लं.चे कोट्स, त्यांची पुस्तकं वगैरेंची शिल्पं लावली आहेत. तसंच फर्ग्युसन रोडवरही फूटपाथवर पु. लं.ची चित्रं लावली आहेत. रोज येता-जाता ती दिसतात. रोज रात्री घरी जाताना मी पु. ल. देशपांडे उद्यानावरून जातो. तेव्हा नकळत नजर डावीकडं त्यांच्या लफ्फेदार सहीवर जाते. मी छातीवर हात ठेवून मनोमन त्यांना नमन करतो आणि पुढं जातो. ‘ते आहेत’, ‘ते आपल्यासाठी इथंच आहेत’ ही भावना मनात दाटून येते. मन प्रसन्न होतं... दिवसाचा सगळा ताण निघून जातो... हेच तर ते करत आले आहेत आपल्यासाठी... हयात होते तेव्हाही आणि आता ऐहिक रूपात नाहीत तेव्हाही! 


----

30 May 2024

महाबळेश्वर ट्रिप २६-२८ मे २०२४

धुक्यातून ‘सुकून’कडे....
------------------------------


महाबळेश्वरला तसं नेहमी जाणं होतं. अगदी महाबळेश्वरपर्यंत गेलो नाही, तर पाचगणी किंवा वाईपर्यंत तर नक्कीच जाणं होतं. दर वेळी तिथं काही तरी नवं गवसल्याचा आनंद मला लाभला आहे. याही वेळी निसर्ग आणि मानवनिर्मित अशा दोन्ही गोष्टींनी मोठं समाधान दिलं. वास्तविक महाबळेश्वर हे महाराष्ट्रातलं ‘अतिपरिचयात् अवज्ञा’ झालेलं पर्यटनस्थळ म्हणायला हवं. यामुळंच ‘महाबळेश्वरला काय जायचं?’ असं नाकं मुरडून विचारणारेही आहेत. 
परवा मी महाबळेश्वरला गेलो, तेव्हाही तो ‘फर्स्ट चॉइस’ नव्हता. उत्तरेकडं सहलीला जायचं (तिथल्या भयंकर तापमानामुळं) रद्द केल्यानंतर महाबळेश्वर हा स्वाभाविक पर्याय होता. मग लगेचच एमटीडीसीचं बुकिंग करून टाकलं. एमटीडीसीचा सरकारी खाक्या नकोसा वाटत असला, तरी त्यांची रिसॉर्ट अतिशय मोक्याच्या व शांत ठिकाणी असल्यानं ते आकर्षण नेहमीच सरकारी खाक्याबद्दलच्या तिरस्कारावर मात करतं आणि शेवटी तिथलंच बुकिंग केलं जातं. वास्तविक ऐन मे महिन्यात महाबळेश्वरच काय, पण कुठल्याही पर्यटनस्थळी जाऊ नये, हे माझं मूळ मत. सगळीकडे असलेल्या पर्यटकांच्या प्रचंड गर्दीचाच एक भाग होऊन हिंदकाळत स्थळदर्शन उरकण्याचा मला भयंकर तिटकारा आहे. यंदा मात्र सर्वांना सोयीचा हाच काळ होता. मग शेवटी निघालो. 
पसरणी घाट चढून पाचगणीच्या हद्दीत आल्यावरच हवेतील बदलानं पहिला सुखद धक्का दिला. हल्ली महाबळेश्वरचं तापमानही पुण्यासारखंच वाढलेलं असतं आणि तिथंही उकडतं, हे मी ऐकून होतो. आम्ही गेलो ते तिन्ही दिवस मात्र हवा अतिशय आल्हाददायक होती आणि कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस होतं. अपेक्षेप्रमाणे पाचगणी, महाबळेश्वर या टप्प्यात प्रचंड गर्दी लागली. ‘बंपर टु बंपर’ ट्रॅफिक होतं. रविवार असल्यानं एका दिवसासाठी महाबळेश्वरमध्ये येणाऱ्यांची गर्दी होती. शिवाय इथं मुंबईहून, गुजरातवरून प्रचंड संख्येनं पर्यटक येत असतात. यंदा ‘एमएच ०१, ०२ ते ०६’ यांच्या जोडीला ‘एमएच ४८’ (वसई-विरार) गाड्यांचीही मोठी गर्दी दिसली. महाबळेश्वरच्या हद्दीत पोचल्यानंतर प्रत्यक्ष एमटीडीसी गाठेपर्यंत आम्हाला दीड तास लागला. (या गडबडीत एंट्री टॅक्स न घेता गाडी सोडली, हाच काय तो दिलासा!) आम्ही सकाळी साडेनऊला निघालो होतो. रिसॉर्टवर येईपर्यंत तीन वाजले होते. जवळपास दीड ते दोन तास उशीर केवळ ट्रॅफिकमुळं झाला होता. आमचा प्रीमियम डीलक्स की लक्झरी (लक्झरी म्हणजे एमटीडीसी देऊ शकेल इतपतच लक्झरी) सूट ताब्यात घेतल्यावर आधी चक्क ताणून दिली. आम्ही रिलॅक्स व्हायलाच आलो होतो. फार काही टाइट, मिनिट टु मिनिट प्रोग्राम ठेवलाच नव्हता. इथं आल्यावर एमटीडीसीनं पहिला धक्का दिला. सूटमध्ये मोबाइलला शून्य रेंज येत होती. दारात आलं की फुल रेंज. इथं फक्त बीएसएनएललाच रेंज येते म्हणे. त्यामुळं आम्ही सूटमध्ये असताना एकदम आदिमानव, तर दारात आलो की लगेच आत्ताची माणसं व्हायचो. असो.
संध्याकाळी सनसेट पॉइंटला गेलो. माझ्याकडं नीलचा २००६ (किंवा ०७) मधला फोटो होता. अरमान नावाच्या घोड्यावर नील व मी बसलो होतो, असा तो फोटो होता. तिथं मला ‘स्मार्टी अरमान’ नावाचा घोडा दिसला. त्याच्या मालकाला (शारूख नाव त्याचं) मी तो जुना फोटो दाखवला. त्याबरोबर तो फारच खूश झाला आणि त्यानं आजूबाजूच्या सर्व घोडेमालकांना आणि पर्यटकांनाही बोलावून बोलावून तो जुना फोटो दाखवला. त्या आनंदात त्यानं नीलला सवलतीत राइड देऊ केली. नीलला खरं तर घोडेस्वारीपेक्षा तिथले फोटो काढण्यात रस होता. पण शारूखचा उत्साह बघून तो तयार झाला. त्याची राइड झाल्यावर घोड्याला दोन पाय उंच करून ‘स्लो मो’मध्ये शूटिंग करण्याचाही कार्यक्रम झाला. एकूण ती संध्याकाळ अतिशय प्रसन्न होती. हवा ढगाळ होती. गार वारं वाहत होतं. आता चहा घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मस्त मसाला मॅगीही तिथं मिळाली. मग दोन्हीचा आस्वाद घेऊन आम्ही थेट मार्केटमध्ये गेलो. तिथं अपेक्षेप्रमाणे पहिल्या वाहनतळावर जागा नव्हतीच. मला दुसरा रस्ता माहिती होता. मग मी मार्केटच्या त्या टोकाला असलेल्या रस्त्याला जाऊन तिथल्या नव्या वाहनतळावर कार पार्क केली व मग आम्ही चालत मार्केटमध्ये आलो. (या मुख्य रस्त्याला डॉ. साबणे रोड असं नाव आहे.) तिथंच जेवलो. मला सईच्या (तांबे) पोस्टमध्ये लिहिलेल्या ‘स्ट्रॉबेरी विथ क्रीम’वाल्या नझीरभाईंची गाडीही दिसली. पण पोट एवढं भरलं होतं, की दुसऱ्या दिवशी त्यांना न्याय देऊ असं ठरवून परतलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी एमटीडीसीच्या वेण्णा कँटीनमध्ये आम्हाला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट होता. पोहे, उडीदवडा सांबार, चटणी, ब्रेड-बटर, अंडाभुर्जी आणि चहा-कॉफी असा मेन्यू होता. बुफे लावला होता. सर्व पदार्थ चांगले होते. हे कँटीनही चांगलं वाटलं. ब्रेकफास्ट करून आम्ही बाहेर पडलो. आज श्री क्षेत्र महाबळेश्वर आणि ऑर्थर सीट पॉइंट एवढी दोनच ठिकाणं बघू, असं ठरवलं. श्री क्षेत्र महाबळेश्वरकडं गावातून जाणारा रस्ता दुरुस्तीमुळं बंद होता. त्यामुळं आम्हाला वेण्णा लेक ओलांडून नाकिंदा मार्गे जावं लागलं. इकडंही गर्दी होतीच. वातावरण मात्र फार सुरेख होतं. ढगाळ हवा, अधूनमधून धुकं आणि घनदाट झाडीतून जाणारे रस्ते हे अगदी स्वप्नवत होतं! श्री क्षेत्र महाबळेश्वरला पंचनद्यांच्या संगमाचं दर्शन घेतलं. इथं यापूर्वी अनेकदा आलो असलो, तरी दर वेळी काही तरी बदललेलं दिसतं. या वेळी बाहेरची दुकानं खूप वाढल्याचं दिसलं. गर्दी होतीच. इथं आम्ही यापूर्वी न बघितलेलं कृष्णाई मंदिर पाहायला मिळालं. मुख्य मंदिराच्या समोरूनच इकडं जायला चांगला दगडी रस्ता केला आहे. हे मंदिर पुरातन आहे आणि पुरातत्त्व खात्याकडून संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केलं आहे. अभिजितनं (थिटे) मला हे मंदिर आवर्जून पाहायला सांगितलं होतं. तिथं गेल्यावर आम्ही त्याला फोन केला आणि त्यानं आणखी बरीच इंटरेस्टिंग माहिती सांगितली. हे मंदिर आणि समोर दिसणाऱ्या दरीतील कृष्णा नदीचं विहंगम दृश्य अगदी अविस्मरणीय होतं. बघितलं नसेल तर अगदी आवर्जून पाहायला जावं, असं हे ठिकाण आहे. या सर्व जागेची उत्तम निगा राखलेली आहे. 

आता जवळपास एक वाजत आला होता. मग तिथंच समोर एका हॉटेलमध्ये जेवलो आणि ऑर्थरसीट पॉइंटकडं निघालो. तिकडं जाताना तर संपूर्ण धुकं होतं. पार्किंग लाइट्स आणि हेडलाइट्स लावूनच गाडी चालवावी लागत होती. अतिशय कमाल वातावरण होतं. इथं ऐन मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आल्याचं सार्थक झालं होतं. ऑर्थर सीट पॉइंटजवळ गाड्यांची लाइन होती. पण मी शेवटपर्यंत गाडी नेली आणि नशिबानं तिथं पार्किंगला जागा मिळाली. मग आम्ही तिथून पॉइंटकडं निघालो. अक्षरश: दहा फुटांपुढचं काही दिसत नव्हतं. दरीच काय, सगळा आसमंत ढगांनी भरला होता. झाडं ओलीचिंब झाली होती. वास्तविक तिथं थंड पेयं विकायला बरेच जण बसले होते. मात्र, आता त्यांच्याकडं चहा-कॉफीची मागणी व्हायला लागली होती.
पुढं टायगर पॉइंटजवळ नीलला तो एक-दोन वर्षांचा असताना, एका दगडावर बसवून फोटो काढला होता. आताही तो दगड तिथं आहे का, याची मला उत्सुकता होती. सुदैवानं तो दगड तिथंच होता. मग नीलला तिथंच, तशाच पोझमध्ये बसवून फोटो काढला. पुढं अगदी ऑर्थर सीट पॉइंटपर्यंत धुक्यातूनच सगळा प्रवास झाला. अगदी त्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन, फोटो काढले. तिथं जरा वेळ बसलो. पावसाळी हवेमुळं असेल, पण नेहमीपेक्षा माकडांचा उपद्रव जरा कमी होता. 
येताना चहासाठी एका टपरीवर थांबलो. तिथल्या मुलानं सांगितलं, की हे असं वातावरण आत्ता दोन दिवसांपासून आहे. कुठल्या तरी झाडाकडं बोट दाखवून ‘हे झाड असं ओलं दिसतंय तर यंदा जोरदार पाऊस येणार’ असं भाकीतही त्यानं वर्तवलं. ‘येऊ दे बाबा’ म्हणालो आणि परतीची वाट धरली.
आता इथून परतताना पुन्हा ट्रॅफिक जॅम लागलंच. महाबळेश्वरमध्ये प्रवेश करताना पुन्हा तिथला माणूस पास मागणार, अशी भीती होती. तसंच झालं. मात्र, ‘कालच आलोय इथं, आज क्षेत्र महाबळेश्वरला गेलो होतो,’ असं जोरात सांगितलं. त्याला गाडीत तिथली पावती दिसली. मग लगेच सोडलं. मग थेट रिसॉर्टवर गेलो आणि ताणून दिली. संध्याकाळी तुलनेनं जवळ असलेल्या लॉडविक पॉइंट किंवा हत्तीमाथा पॉइंटला जायचं ठरवलं. मी अनेकदा इथं आलो असलो, तरी हा पॉइंट पाहायचा राहून गेला होता. आमच्या रिसॉर्टपासून हा पॉइंट अगदी दोन-तीन किलोमीटर एवढा जवळ होता. तिथं गेलो. वाहनतळापासून आत चालत जायचं होतं. मग रमत-गमत तिकडं गेलो. तिथंही तोवर पूर्ण धुक्याची चादर पसरली होती. पीटर लॉडविक हा महाबळेश्वरवर पहिलं पाऊल ठेवणारा इंग्रज माणूस. त्याच्या स्मृत्यर्थ इथं एक स्तंभ उभारला आहे. मध्यंतरी तो वीज पडून कोसळला तेव्हा महाबळेश्वर हॉटेल ओनर्स असोसिएशननं वर्गणी काढून तो पुन्हा उभारला आणि त्यावर वीज प्रतिबंधक यंत्रणाही बसवली आहे. इथून पुढं तीनशे मीटरवर हत्तीमाथा पॉइंट होता. मग तिथवर गेलो. मात्र, धुक्यामुळं आजूबाजूचं काहीच दिसत नव्हतं. अर्थात वातावरण भन्नाटच होतं. आता जवळपास साडेसहा वाजून गेले होते. मग माघारी फिरलो.
पुन्हा मार्केटमध्ये गेलो. या वेळी अलीकडच्या वाहनतळावर जागा मिळाली. मग चालत मार्केट फिरलो. आज नझीरभाईंकडं ‘स्ट्रॉबेरी विथ क्रीम’ खायचंच होतं. ते खाऊन झाल्यावर थोडा वेळ परत फिरलो. मग शेजारच्या हॉटेलमध्ये साधंसं जेवलो व रिसॉर्टवर परतलो. आजचा दिवस मस्त भटकंती झाली होती आणि धुक्यामुळं जो काही ‘सुकून’ मिळाला होता, त्याचं वर्णन करणं अशक्य!
सकाळी आणि संध्याकाळी मी आमच्या सूटसमोरच्या रस्त्यावर शतपावली करायचो. वर जाणारा रस्ता ‘राजभवना’कडं जातो. मी पहिल्याच दिवशी तिथपर्यंत चक्कर मारून आलो. इतर सूटमध्ये राहणारे अनेक पर्यटक घोळक्यानं या रस्त्यावर फिरताना दिसायचे. आजूबाजूला माकडं भरपूर. ती आपल्या कारवरदेखील चढून बसतात. त्यामुळं तिथं वावरताना हे भान सतत बाळगावं लागतं. 

तिसऱ्या दिवशी आम्ही चेकआउट करणार होतो. सकाळी उपमा, इडली असा ब्रेकफास्ट झाला. बरोबर दहा वाजता रिसॉर्ट सोडलं. आम्हाला काही घाई नव्हती. येताना थांबत थांबत आम्ही येणार होतो. फक्त वरच्या ‘मॅप्रो’त न थांबता खाली वाईच्या पुढं झालेल्या त्यांच्या फॅक्टरीजवळच्या ‘मॅप्रो’त थांबायचं ठरवलं होतं. वरच्या ‘मॅप्रो’बाहेर फक्त स्ट्रॉबेरी घेतल्या. पुढं मेटगुताड इथं डोंगरावर विनीत केंजळे यांचं ‘व्हिंटेज माइल्स म्युझियम’ बघितलं. इथं सर्व प्रकारच्या दुचाकींचं अप्रतिम कलेक्शन आहे. दोन मोठ्या शेड्स आहेत. तिथं साधारण दोनशे ते तीनशे तरी दुचाकींची मॉडेल ठेवली आहेत. तिथं ‘लक्ष्मी ४८’ गाडी बघून मला फारच आनंद झाला. आमच्या जामखेडच्या घरी काकाकडं ही गाडी होती. लहानपणी या गाडीवरून चक्कर मारायची, हा माझा नेहमीचा कार्यक्रम असायचा. कोल्हापूरच्या घाटगे इंडस्ट्रीजनं ही गाडी काढली होती. तिला दोनच गिअर होते. तिचं वैशिष्ट्य म्हणजे, पायडल उलटं फिरवलं की तिचे ब्रेक लागायचे. ही गाडी ज्याला चालवायला यायची त्याला यायची. बाकी कुणाला ती चालवणं जमायचं नाही. ही गाडी दिसल्यानं मला एकदम लहानपण आठवलं. या प्रदर्शनाच्या तिकिटासाठी दिलेले शंभर रुपये तिथंच वसूल झाले. मग नंतर आमच्याकडं एके काळी असलेल्या लूना, एमटी-८०, बॉक्सर अशा सगळ्या दुचाकी गाड्या नीलला दाखवल्या. या प्रदर्शनात परदेशांतील, आपल्या देशातील विविध राज्यांतील अशा अनेक प्रकारच्या दुचाकी बघायला मिळतात. केंजळे यांना आता हे प्रदर्शन आणखी वाढवायचंय. अजून बघितलं नसेल तर अगदी आवर्जून बघा. या ट्रिपमधलं हे नवं फाइंड!
पुढं चीझ फॅक्टरीला थांबलो. पण ते प्रॉडक्शन नेमकं मंगळवारी बंद असतं म्हणे. मग तिथं जामुन शॉट घेतले. सिरप आदी खरेदी झाली. पुढं पाचगणीला टेबललँडला थांबलो. इथं घोडेवाले अगदी मागं लागले होते. त्यांचा ससेमिरा (की घोडेमिरा?) चुकवत चालत पुढं निघालो. इथं पांडव केव्हज आहेत त्या खाली उतरून कधी बघितल्या नव्हत्या. मग खाली उतरून त्या पाहून आलो. तिथं एक रेस्टॉरंट आहे. अतिशय छान जागा आहे. आत एका अरुंद जागेतून एक चक्कर मारता येते. तिथं शंकराची मूर्ती ठेवली आहे. पंधरा रुपये दरडोई तिकीट ठेवलं आहे. पण तिथंही स्कॅनर वगैरे आहे. सरबत घेतलं तिथंही स्कॅनरनं पैसे दिले. आपलं यूपीआय असं जंगलात, गुहेत पोचलेलं बघून फारच भारी वाटलं. तिथून त्या दगडी पायऱ्या चढून वर आलो. तिथं दोन वृद्ध गृहस्थ दुर्बिणी घेऊन बसले होते. ‘पन्नास रुपयांत पाच पॉइंट दुर्बिणीतून दाखवतो’ असं म्हणाले. मग मी नीलला दाखवा, म्हटलं. त्यांनी जोडीनं आम्हालाही सगळी माहिती दिली. पांढरी दाढी असलेले ते गृहस्थ माहितगार वाटत होते. इथून पुढं टायगर केव्हज नावाचा एक पॉइंट होता. मात्र, तिथं जायचा कंटाळा आला आणि आम्ही परत फिरलो. पाचगणीतून निघालो आणि घाट उतरून वाईत थांबलो. नातू फार्मला अनेकदा थांबून जेवलोय. आताही तिथंच थांबलो आणि मस्त थालीपीठ खाल्लं. मग वाईत जाऊन महागणपतीचं दर्शन घेणं मस्टच. अगदी शांतपणे, छान दर्शन झालं. तिथून मग ‘मॅप्रो फॅक्टरी’त थांबलो. इथं बरेच साहसी खेळ वगैरे आहेत. नीलला तिथं स्काय सायकल चालवायची होती. ती चालवून झाली. मग सँडविचचं पार्सल घेतलं आणि गाडी सुसाट पुण्याच्या दिशेनं सोडली.
येताना फारशी वाहतूक कोंडी लागली नाही. मात्र, सातारा रस्त्यावर अजूनही ठिकठिकाणी उड्डाणपूल, बायपास असली कामं सुरूच आहेत. हा रस्ता संपूर्णपणे एकदम दुरुस्त कधी होणार देव जाणे!
पुण्यात शिरलो आणि गरमागरम हवेनं आमचं स्वागत केलं. धुक्यातला ‘सुकून’ विरला होता आणि उन्हानं सुकून जाणं तेवढं उरलं होतं...

----

(महाबळेश्वरचे फोटो पाहण्यासाठी माझ्या फेसबुक वॉलला भेट द्या.)

-----

अशोक रानडे - कृतज्ञता

आमची ‘रानडे इन्स्टिट्यूट’
--------------------------------


शनिवारी (२५ मे) रोजी दुपारी दीडच्या सुमारास ‘सकाळ मनी’चे संपादक आणि माझे एके काळचे ज्येष्ठ सहकारी मुकुंद लेले यांचा व्हॉट्सअपवर मेसेज आला. ‘अशोक रानडे गेले’ असं त्यात लिहिलं होतं. मला हा धक्काच होता. याचं कारण अगदी एक-दोन महिन्यांपूर्वीच रानडेंची मुलगी अरुंधती आमच्या ऑफिसला आली होती, तेव्हाच रानडेंचा विषय निघाला होता. मी त्यांच्या तब्येतीची चौकशीही केली होती. मात्र, तेव्हा ते काही खूप आजारी वगैरे असे नव्हते. त्यांना दीर्घ काळ मधुमेह होता, ही गोष्ट खरी होती. मात्र, तरीही शनिवारी त्यांच्या जाण्याने अगदीच धक्का बसला. 


दुसऱ्या दिवशी अनेकांनी रानडेंविषयी फेसबुकवर भरभरून लिहिलं. त्यात माझे अनेक सहकारी होते. ते सगळं वाचत असताना माझं मन २६-२७ वर्षं मागं गेलं. 
मी एक सप्टेंबर १९९७ रोजी ‘सकाळ’मध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून रुजू झालो. त्यापूर्वी अल्प काळ मी ‘लोकसत्ता’त काम केलं होतं. मात्र, ‘सकाळ’मध्ये आल्यानंतर अनेक दिग्गजांची ओळख झाली. ज्यांची नावं आपण लहानपणापासून पेपरमध्ये वाचत आलोय, अशा मंडळींसोबत आता काम करायला मिळणार, हा आनंद काही वेगळाच होता. कुवळेकरसाहेब, पाध्येसाहेब, राजीव साबडे, अशोक रानडे, वरुणराज भिडे, प्रल्हाद सावंत, शशिकांत भागवत, विजय साळुंके, मल्हार अरणकल्ले अशी सर्व मंडळी आम्हाला सीनियर होती. यातील राजीव साबडे सरांकडे आमची बॅच सोपवण्यात आली. एकेक आठवडा एकेका विभागात आम्ही काम करू लागलो. तेव्हा डेस्कवर विजय साळुंके, अशोक रानडे, मुकुंद मोघे, यमाजी मालकर, लक्ष्मण रत्नपारखे, चंद्रशेखर पटवर्धन, अनिल पवार, नवनीत देशपांडे, उदय हर्डीकर, गोपाळ जोशी, मुकुंद लेले, वर्षा कुलकर्णी, स्वाती राजे, स्वाती महाळंक, नयना निर्गुण, मीना संभू आदी मंडळी कामाला असायची. यापैकी रानडेंचा दरारा आम्ही पहिल्याच आठवड्यात ऐकला आणि पाहिला. 
रानडेंना ‘सर’ वगैरे म्हटलेलं आवडायचं नाही. आताही मी त्यांचा उल्लेख ‘रानडे’ असाच करतोय. मात्र, यात अनादर नसून, त्यांनीच घालून दिलेली शिस्त आहे. ऑफिसमध्ये संपादक आणि वृत्तसंपादक हेच दोन साहेब, असं त्यांचं म्हणणं असे. तेव्हा ‘सकाळ’मध्ये ‘सर’ असं कुणी म्हणायचंही नाही. संपादकांना ‘साहेब’ असंच म्हणण्याची पद्धत होती. रानडेंचा अचूकतेचा आग्रह, शब्दांची योग्य निवड करण्याची हातोटी, अनावश्यक अलंकृत भाषा वापरण्याची नावड, शुद्धलेखन वा प्रमाणलेखनाची त्यांची शिस्त याविषयी बहुतेकांनी लिहिलंच आहे. रानडेंची ती ओळखच होती. अगदी साप्ताहिक मीटिंगमध्ये एखाद्या शब्दाविषयी काही वाद निर्माण झाला, तर संपादकही ‘रानडे सांगतील तसं करा’ असं सांगायचे. रानडेंचा शब्द अंतिम असायचा. रानडेंचा दरारा बघून ‘असं का?’ ‘तसंच का?’ हे उलट विचारायची आमची हिंमत नव्हती. ते सांगतील ते आम्ही गुपचूप ऐकत गेलो. अर्थात विचारलं असतं, तरी त्यांच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं असतील, याबद्दल सर्वांना खात्री असायची. ‘एव्हरेस्ट सर केलेल्या हृषीकेश चव्हाण यांनी...’ अशा पद्धतीची वाक्यरचना चूक आहे, हे मला पहिल्यांदा रानडेंकडून कळलं. त्यांचं म्हणणं, हृषीकेश चव्हाण हे पुरुष आहेत तर ‘एव्हरेस्ट सर केलेले हृषीकेश चव्हाण यांनी...’ असंच लिहायला हवं. तिथं स्त्री असेल तर उदा. ‘एव्हरेस्ट सर केलेल्या बचेंद्री पाल यांनी...’ ही वाक्यरचना योग्य ठरेल. तुम्हाला अगदी ‘एव्हरेस्ट सर केलेल्या’ असंच लिहायचं असेल तर पुढं ‘हृषीकेश चव्हाण यांनी...’ याऐवजी ‘हृषीकेश चव्हाणांनी’ असे लिहा, असं त्यांनी सांगितलं होतं. थोडक्यात, एखादे वाक्य लिहिताना किती बारकाईने विचार करायचा असतो, हे आम्हाला रानडेंकडून (खरं तर त्यांच्याच सांगण्यानुसार, ‘रानड्यांकडून’) समजलं. तीच गोष्ट निधनाच्या बातमीची. ‘अमुक तमुक यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर अमुक ठिकाणी अंत्यसंस्कार झाले,’ अशा क्रमाने बातमी लिहिली, की रानडे चिडायचे. ते म्हणायचे, ‘अहो, याचा अर्थ त्यांच्या पत्नी, मुले व नातवंडांवर अंत्यसंस्कार झाले असा होतो. त्यामुळे ते वाक्य संपलं, की पुन्हा अमुक तमुक यांचं नाव लिहून मग त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले, असं लिहायला पाहिजे.’ 
मग वाटायचं, आपण शाळेत नक्की मराठी शिकलो की नाही?
‘सकाळ’मध्ये अनेक वर्षं रात्री ८ ते २ अशी मुख्य उपसंपादकांची ड्युटी असे. रानडे या ड्युटीला येत तेव्हा रात्रपाळीचे आर्टिस्ट आपल्याला घरी जायला तीन वाजणार आहेत, याची खूणगाठ बांधूनच ऑफिसला येत. रानडे पान १ अत्यंत बारकाईने वाचत. एकाही ओळीत, एकाही शब्दात चूक झालेली त्यांना खपत नसे. तेव्हा वेगळ्या पुरवण्या रोज नसायच्या. एक ते १६ पानी सलग ब्लॅक अँड व्हाइट अंक असायचा. प्रिंटिंग सुरू झाल्यावर ताजा ताजा अंक तेथील कर्मचारी वर आणून देत. तो अक्षरश: गरमागरम, ताजा अंक सगळा उलगडून नीट वाचावा लागे. पानांचे नंबर, तारीख-वार, वाढावे (मजकुराचे पुढल्या पानांवर दिलेले कंटिन्युएशन) हे सगळं बरोबर आहे ना, हे तपासून मग त्या अंकावर मुख्य उपसंपादकाला सही करावी लागे. तो सही केलेला अंक मग तो कर्मचारी खाली घेऊन जात असे आणि मग मशिनचा स्पीड धाडधाड वाढून अंक वेगाने छापला जात असे. अशा अंकावर सही करून झाली, की रानडे मंडईत जायला निघत. आम्हीही त्यांच्याबरोबर जायचो. रानडे टिळक रोडला राहायचे. त्यांनी कधीही वाहन वापरलं नाही. मग काही सहकारी त्यांना डबलसीट घेऊन मंडईत येत. तिथं तिखटजाळ सँपल आणि पाव खायचा त्यांचा बेत असे. रात्रपाळी करून पहाटे तीन वाजता सँपल-पाव खाणारे रानडे हे एक अचाट गृहस्थ होते. त्यांच्या अचाटपणाची कथा इथंच संपत नाही. यानंतर आम्ही २०-२२ वर्षांचे ‘तरुण’ थकल्या-भागल्या अवस्थेत कधी रूमवर जाऊन पडतो, अशा बेताला आलेले असताना रानडे मात्र ‘चला, सिंहगडावर जाऊन येऊ’ असं म्हणायचे तेव्हा आमच्या डोळ्यांसमोर अंधारीच यायची. रानडे मात्र खरोखर तिथून चालत सिंहगड वगैरे फिरून येत, अनेकदा ते चालत कोकणात उतरत आणि किनारपट्टी वगैरे भटकून मग दोन-तीन दिवसांनी परत येत. त्यांच्याबरोबर चालायला जायचा योग मला कधी आला नाही. मात्र, ज्यांना आला त्यांच्यासाठी तो कायमचा लक्षात राहणारा अनुभव ठरला असेल यात वाद नाही. ऑफिसमधले रानडे वेगळे होते आणि ऑफिसबाहेरचे रानडे वेगळे होते. कधी तरी एखादाच मिश्कील, पण मार्मिक शेरा ते असा मारायचे, की त्यातूनही त्यांच्या बुद्धिमान स्वभावाची झलक दिसायची. पं. जितेंद्र अभिषेकी गेले, तेव्हा रानडेंनी अग्रलेख लिहिला होता. ‘स्वराभिषेक थांबला...’ असं त्याचं शीर्षक होतं, हे मला आजही आठवतं. साधं-सरळ, पण नेमकं असं शीर्षक. उगाच आलंकारिक, भरजरी शब्दांचा सोस नाही. हा अग्रलेख लिहून झाल्यावर त्यांनी तो मला नजरेखालून घालायला सांगितला होता, तेव्हा ‘परुळेकर पुरस्कार’ मिळाल्याएवढा आनंद मला झाला होता!
रानडे संगीतातील मोठे जाणकार होते. ते स्वत: उत्तम तबला वाजवत. स्वाभाविकच ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची बातमी व रसग्रहण (नंतर फक्त रसग्रहण) तेच करणार, ही काळ्या दगडावरची रेघ असायची. तेव्हा सवाई गंधर्व महोत्सव रात्र रात्र चाले. उशिरातील उशिरा झालेल्या गायन वा वादनाची बातमी अंकात घालविण्याचा तेव्हा आमचा अट्टहास असे. रानडे तिथंच पत्रकार कक्षात बसून बातमी लिहीत. तेव्हा कागदावर पेननं बातमी लिहावी लागायची. मग ऑफिसबॉय ती कॉपी न्यायला तिथं यायचे. ती बातमी मग ऑफिसला जाऊन, ऑपरेट होऊन, प्रूफरीडिंग होऊन पानात लागायची आणि तो ताजा अंक पहाटे चार वाजता ‘सवाई मंडपा’त यायचा. अगदी तीन-चार तासांपूर्वी झालेल्या मैफलीची साद्यंत बातमी रसिकांना ती मैफल अजूनही सुरूच असताना वाचायला मिळायची. रानडेंचा कान अगदी तयार होता. अवास्तव, फालतू कौतुक त्यांना आवडत नसे. ‘पंडित’ ही उपाधी कुणामागे लावावी, याविषयी त्यांची ठाम मतं होती. त्यामुळं कुणाच्याही मागे पंडित लिहिताना आजही माझा हात थरथरतो आणि रानडेंची आठवण येते. 
नंतरच्या टप्प्यात रानडेंकडं सातारा आवृत्तीची जबाबदारी आली. ती त्यांनी एवढ्या तळमळीनं निभावली, की खरोखर कमाल वाटते. श्रीकांत कात्रे, चिंचकर, साळुंके, सोळसकर, बापू शिंदे आदी आमचे सर्व सीनियर-ज्युनिअर सहकारी रानडेंच्या करड्या शिस्तीत तावून-सुलाखून तयार झाले. तेव्हा या सर्वांना आम्ही चिडवायचो. ‘रानडेंचा सासुरवास सोसा’ म्हणायचो. मात्र, त्यांची कामातली कमिटमेंटही आम्ही पाहत होतो. जे काम वरिष्ठांनी सोपवलं आहे ते अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने, सचोटीने करायचं हा एक मोठाच धडा त्यांनी आपल्या वागणुकीतून घालून दिला होता. रानडेंच्या शिस्तीला जुने सहकारीही वचकून असत, तर नव्या सहकाऱ्यांचा प्रश्नच नसायचा. एकेका वाक्यासाठी त्यांनी अर्धा अर्धा तास एखाद्या नव्या मुलाला पिळून काढलेलं आहे. अर्थात ती चूक पुन्हा त्या मुलाकडून आयुष्यात कधीही होत नसे, हे सांगायला नको. भाषांतर करताना एखाद्या शब्दाचा अर्थ विचारला, तर रानडे स्वत: सांगायचे नाहीत. डिक्शनरी बघायला सांगायचे. एखादा संदर्भ विचारला, तर थेट सांगायचे नाहीत. ‘ग्रंथालयात जाऊन शोधा,’ असं म्हणायचे. तेव्हा त्यांचा राग यायचा; पण आज या शिकवणुकीचं मोल कळतं आणि नकळत डोळे पाणावतात. वास्तविक, इतर चार सहकाऱ्यांसारखे तेही ‘आपण बरं की आपलं काम बरं’ अशा पद्धतीने काम करू शकले असते. मात्र, त्यांनी पुढची पिढी घडवली. अक्षरश: मातीच्या गोळ्याला आकार द्यावा, तशी घडवली. आज मी (नेहा लिमयेसोबत) ‘लिहू या बिनचूक मराठी’सारखं पुस्तक लिहायचं धाडस केलं, त्यामागे रानडेंनी आमच्यावर घेतलेल्या त्या निरपेक्ष कष्टांचा वाटा मोठा आहे. हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर त्यांना ते नेऊन द्यावं, अशी माझी फार इच्छा होती. मात्र, एकीकडं धीरही होत नव्हता. या पुस्तकात त्यांनी काही चुका काढल्या तर, अशी भीती वाटायची. अर्थात पुस्तकाच्या निमित्ताने त्यांना भेटायचं आणि आशीर्वाद घ्यायचे, हे नक्की ठरलं होतं. मात्र, ते आता राहूनच गेलं.
मग वाटलं, रानडे शरीरानं फक्त गेले. आपण जोवर मराठी शब्द वापरत राहू तोवर ते आता आपल्या मेंदूत, अंतर्मनात, खोल कुठे तरी असणारच आहेत.
रानडे, तुमच्याविषयी ही कृतज्ञ शब्दांजली! काही चुकलं असल्यास माफ करा...

--------

(शीर्षकाविषयी - पुण्यात विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या व संज्ञापन विभाग फर्ग्युसन रोडवर ज्या वास्तूत आहे, ती ‘रानडे इन्स्टिट्यूट’ म्हणून ओळखली जाते. पुण्यातले बहुतेक पत्रकार तिथं शिकलेले असल्यानं सर्वच जण ‘रानडे इन्स्टिट्यूट’चे विद्यार्थी आहेत. आम्ही नव्वदच्या दशकात ‘सकाळ’मध्ये काम करणारे काही सहकारी मात्र अधिक भाग्यवान; कारण आम्हाला अशोक श्री. रानडे यांच्याकडं शिकायला मिळालं. रानडे स्वत: एक इन्स्टिट्यूटच होते. त्यामुळं दोन्ही अर्थ सांगणारं हे शीर्षक...)

-----

30 Apr 2024

पाणी, दुष्काळ - मटा दोन लेख

१. सावध ऐका पुढल्या हाका...
------------------------------------

(बंगळुरू शहरात मार्च, एप्रिल २०२४ या काळात अभूतपूर्व पाणीटंचाई जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बंगळुरू जात्यात,  तर पुणे सुपात’ हे सांगणारा हा लेख...)

बेंगळुरू शहरातून सध्या तीव्र पाणीटंचाईच्या बातम्या येत आहेत, त्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. बेंगळुरू शहर हे भारतातलं एक सुंदर, नीटस शहर. पुण्याची अनेकार्थांनी थोरली ‘सिस्टर सिटी’ म्हणता येईल बेंगळुरूला. दोन्ही शहरांत बरीच साम्यस्थळं आहेत. सुंदर हवा, उत्तमोत्तम शिक्षण संस्था, ब्रिटिशकालीन लष्करी तळ, उद्याने आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुबलक पाणी. अलीकडच्या काळात दोन्ही शहरांनी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात घेतलेली आघाडीही अगदी सारखी. फरक म्हणाल तर एकच. बेंगळुरू हे राजधानीचे शहर, तर पुणे मात्र नाही. बाकी तीन-चार दशकांपूर्वी ही दोन्ही शहरं उद्यानांची, हवेशीर, आटोपशीर आणि ज्येष्ठ नागरिकांना बंगले बांधून राहण्यायोग्य अशीच होती. मात्र, गेल्या दोन दशकांत दोन्ही शहरांची बेसुमार वाढ झाली. या वाढीसोबत येणाऱ्या सर्व समस्याही या शहरांना ग्रासू लागल्या आहेत. पाणीटंचाईच्या बाबतीत बेंगळुरू आज जात्यात, तर पुणे सुपात आहे असेच म्हणावे लागेल.
बेंगळुरूला सध्या पाणीटंचाईची खूप जास्त प्रमाणात झळ बसते आहे. गेल्या वर्षी कमी झालेला पाऊस हे एक कारण आहेच; मात्र, बेंगळुरू शहरातील कूपनलिकांपैकी जवळपास ७० ते ८० टक्के कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत, हे अधिक चिंताजनक आहे. भूजल पातळी किती घटली आहे, याचा अंदाज यावरून येऊ शकतो. बेंगळुरू शहर व परिसराची लोकसंख्या सध्या सव्वा कोटीच्या आसपास आहे. सन २०११ च्या जनगणनेच्या वेळी ती ८० ते ८५ लाख एवढी होती. या शहराच्या लोकसंख्या वाढीचा वेग प्रचंड आहे. हे शहर चहूबाजूंनी विस्तारते आहे. या अवाढव्य, वाढत्या शहराची गरज पुरवू शकेल, एवढा पाण्याचे स्रोत तेथे नाहीत. कर्नाटक व तमिळनाडूत कावेरीच्या पाण्यावरील वाद जुना आहे. त्या वादाचा फटकाही बेंगळुरूवासीयांना बसतोच आहे. मुळात एवढ्या मोठ्या महानगरातील प्रचंड बांधकामे, मूलभूत सोयीसुविधांची सतत वाढत जाणारी मागणी, स्थलांतरितांची वाढती संख्या आणि उद्योगांचे विस्तारीकरण या कारणांमुळे पाण्याची गरज मोठी आहे. एखाद्या वर्षी पाऊस कमी पडला, तर टंचाई जाणवते यापेक्षाही मुळातच त्या परिसरातील पाण्याचे स्रोत अतिरक्त उपशामुळे आटत चालले आहेत, हे अतिशय गंभीर आहे. विकासाचे विकेंद्रीकरण व्हायला हवे. याऐवजी आपल्याकडे सर्व विकास हा महानगरांतच होतो किंवा तसा तो होत असल्याचा समज, यामुळे खेडी किंवा मध्यम आकाराची गावे ओस पडत आहेत आणि सर्व लोक नाइलाजाने महानगरांकडे धाव घेत आहेत. यामुळे दुहेरी तोटा होत आहे. महानगरांवरील ताण प्रचंड वाढत आहे आणि दुसरीकडे त्या तुलनेत तेथे असलेल्या पाण्यासारख्या मूलभूत बाबींच्या अतिवापरामुळे त्यांची टंचाईही निर्माण होत आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवडची मिळून लोकसंख्या सध्या पाऊण कोटीच्या वर गेली आहे, हे निश्चित. पुण्याच्या उशाला चार धरणे आहेत. देशातील महाकाय धरणांचा आकार व साठवण क्षमता बघता ही तशी चिमुकली धरणे आहेत. या चारही धरणांना मिळून ‘खडकवासला प्रकल्प’ म्हणतात. या प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता २९ टीएमसी आहे. (एकट्या कोयना, उजनी व जायकवाडी या मोठ्या धरणांची क्षमता प्रत्येकी १०० टीएमसीहून अधिक आहे, यावरून हे लक्षात येईल.) यात पिंपरीला पाणीपुरवठा करणारे पवना व नवे झालेले भामा आसखेड या दोन धरणांची मिळून क्षमता साधारण १५ टीएमसी आहे. फक्त पुण्यासाठी असलेल्या खडकवासला प्रकल्पातून पुण्याला अधिकृतपणे केवळ ११ टीएमसी पाणी मंजूर आहे. प्रत्यक्षात पुणे महापालिकेकडून १५ ते १७ टीएमसी पाणी उचलले जाते. उर्वरित पाणी पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूरपर्यंतच्या गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी आवर्तनाच्या माध्यमातून दिले जाते. थोडक्यात, या पाऊण कोटी लोकसंख्येला सध्या साधारण ३० ते ३२ टीएमसी पाणी लागते. पुढील दहा वर्षांतच पुण्याची लोकसंख्या एक कोटीहून अधिक होईल, हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नाही. ‘पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणा’ची (पीएमआरडीए) वाढती हद्द पाहिली तरी याची साक्ष पटेल. मुंबई शहराच्या आडव्या वाढीला जशा मर्यादा आहेत, तशा पुण्याला नाहीत. त्यामुळे पुढील काळात पुणे आणखी मोठ्या प्रमाणात विस्तारू शकते. पुणे शहराच्या भोवती होऊ घातलेला ८० किलोमीटर लांबीचा वर्तुळाकार मार्ग, पुणे ते छत्रपती संभाजीनगर व पुणे ते बेंगळुरू हे दोन कोरे नवे ग्रीन फील्ड महामार्ग, (झाला तर) पुढील चार वर्षांत होणारा पुरंदरचा नवा विमानतळ, पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवरील मिसिंग लिंकचे काम पूर्ण झाल्यावर आणखी जवळ येणारा नवी मुंबईचा कर्जत-खोपोलीपर्यंतचा परिसर हे सर्व पाहता, पुणे शहर केवढे विस्तारू शकते, याची आपण कल्पना करू शकतो. उंच उंच इमारतींच्या अनेक टाउनशिप आत्ताच शहरात अनेक ठिकाणी उभ्या राहत आहेत. रिंग रोडलगत मेट्रोही प्रस्तावित आहे. याशिवाय शहरातील मेट्रोमार्गांचा कालबद्ध विस्तार होणारच आहे. त्यामुळे पूर्वेला यवत ते दौंड, नैर्ऋत्येला शिरवळ, ईशान्येला रांजणगाव-शिरूर, व उत्तरेला लोणावळ्यापर्यंत पुणे शहर सलगपणे विस्तारू शकते. मुंबई महानगर परिसराप्रमाणेच येथेही किमान पाच महापालिका होतील, अशी शक्यता आहे.
महाराष्ट्रातील सर्व विकास हा मुंबई-पुणे-नाशिक याच त्रिकोणात एकवटला आहे, हे कटू असले तरी सत्य आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून या परिसराकडे सातत्याने, मोठ्या प्रमाणावर होत असलेले स्थलांतर पुढील काळात कमी होईल किंवा थांबेल, अशी कोणतीही चिन्हे आज दिसत नाहीत. त्यामुळे आगामी काळात या प्रचंड लोकसंख्येला लागणारे पाणी आपण कुठून पुरवणार, हा मोठा प्रश्न आहे. पुणे महापालिकेने वरसगावच्या वरच्या बाजूला आणखी एक स्वत:च्या मालकीचे धरण बांधावे, अशी एक मागणी अधूनमधून होत असते. मात्र, ही बाब पालिकेच्या आवाक्याबाहेर आहे. मुळशी धरण हे टाटांच्या खासगी मालकीचे आहे. त्यातून काही पाणी विकत घेऊन खालच्या धरणांत सोडावे, असाही एक प्रस्ताव आहे. मात्र, मुळात पावसाद्वारे पडणारे सर्वच्या सर्व पाणी आपण अडवू शकणार आहोत का, हाच प्रश्न आहे. याशिवाय बेसुमार बांधकामे, त्यासाठी होणारी टेकड्यांची लचकेतोड, कमी होत जाणारे हरित आच्छादन या सर्वांमुळे ऋतुचक्रात होणारे विचित्र बदल आपण अद्याप थांबवू शकलेलो नाही. किंबहुना हा निसर्ग पुढे आपल्याला काय काय रूपे दाखवील, याचा आपल्याला आत्ता मुळीच अंदाज नाही. असे असताना फुगत जाणाऱ्या महानगरांमधील लोकांनी केवळ आपल्या नशिबाच्या हवाल्यावर पुढचे दिवस काढावेत, असेच आत्ताचे चित्र आहे.
जलसंवर्धन, नद्यांची स्वच्छता, सोसायट्यांमधील चालू अवस्थेतील रेन हार्वेस्टिंग प्रकल्प आणि टेकड्या वाचवणे असे काही उपाय करून आपण पाणी वाचवू शकतो. पाण्याचा अनिर्बंध, बेबंद वापर करण्याची सवय बदलण्याचीही गरज आहे. बेंगळुरूइतक्या नाही, पण पाणीटंचाईच्या झळा आपल्याला एरवी कमी-अधिक प्रमाणात बसतच असतात. ही समस्या हाताबाहेर जाऊ नये, यासाठी पाणी जपून वापरण्याची आणि भविष्यातील गरजा ओळखून पाण्याचा नियंत्रित वापर करण्याची आवश्यकता आहे. ‘सावध ऐका पुढल्या हाका’ असे म्हणावेसे वाटते, ते यामुळेच! पुण्याचे पाण्याचे सुख कायम राहावे, असे वाटत असेल, तर आजच विविध उपाय योजून संभाव्य पाणीसंकटाचा सामना करण्याची तयारी सर्व नागरिकांनी ठेवायला हवी.


----

(पूर्वप्रसिद्धी : १७ मार्च २०२४; महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती)

-------

२. खोल खोल पाणी...
--------------------------

(पुण्यात एप्रिलमध्ये बंगळुरूसारखीच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. वरील लेखाचा उत्तरार्धच असल्यासारखा हा लेख वरील लेखानंतर पंधराच दिवसांनी लिहिण्याची वेळ आली...)



पुण्यातील पाणीटंचाईचे संकट वाटले होते त्याहून लवकर येऊन धडकले आहे. यंदा मार्च महिन्यातील असाधारण उन्हामुळे सगळा देशच भाजून निघाला. ‘ग्लोबल वॉर्मिंग’चे परिणाम आपण सगळे भोगत आहोत. जागतिक तापमानवाढीचे संकट मोठे आहे. त्याच्या झळा वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्याला बसत आहेत, यापुढेही बसणार आहेत. ‘सावध ऐका पुढल्या हाका’ या लेखात (मटा, १७ मार्च) ‘बेंगळुरू जात्यात, तर पुणे सुपात आहे,’ असा उल्लेख प्रस्तुत लेखकाने केला होता. मात्र, केवळ तीन आठवड्यांतच पुणेही जात्यात भरडून निघाले असल्याचा अनुभव येत आहे. सुदैवाने येथील परिस्थिती अजूनही हाताबाहेर गेलेली नाही. पाण्याच्या संकटावर लवकर उपाययोजना केल्या नाहीत, तर मात्र तशी स्थिती ओढवू शकते.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत सध्या अवघा १२ टीएमसी साठा आहे. वाढत्या, कडक उन्हाळ्यामुळे बाष्पीभवनातून कमी होणाऱ्या पाण्याचा अंदाज चुकू शकतो. अपेक्षेपेक्षा जास्त पाणी बाष्पीभवनाद्वारे कमी होऊ शकते. याशिवाय पिकांसाठी दोन उन्हाळी आवर्तने असतात. हे सगळे गृहीत धरल्यास सध्याचे पाणी १५ जुलैपर्यंत पुरवणे जलसंपदा खात्याला जिकिरीचे होऊ शकते. त्यामुळेच गेल्या गुरुवारपासून ‘देखभाल दुरुस्ती’ या गोंडस नावाखाली पुण्याचे पाणी दर गुरुवारी बंद ठेवण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहेच. खरे तर एवढी तीव्र पाणीटंचाई असेल तर आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा होणार नाही, असे महापालिका जाहीर करू शकते. मात्र, ‘आम्ही पाण्याबाबत सुखी आहोत,’ या ‘इगो’चे काय करायचे? सातही दिवस भरपूर पाणीपुरवठा होणारे शहर हा लौकिक पुण्याने केव्हाच गमावला आहे. मात्र, शहामृगाप्रमाणे वाळूत तोंड खुपसून बसलेल्या येथील राज्यकर्त्यांना आणि प्रशासनाला ते जाहीरपणे मान्य करायचे नाही. त्यांना पाण्याच्या वहनातील गळती दिसत नाही, उपनगरांत रोज वाढत चाललेले टँकर दिसत नाहीत, पेठांमध्ये वर्षानुवर्षे ‘कमी दाबाने’ येणारे पाणी दिसत नाही, त्यांना रखडलेले ‘एसटीपी’ दिसत नाहीत, त्यांना ‘२४ बाय ७’ पाणीपुरवठा योजनेचे बारा वाजलेले दिसत नाहीत, त्यांना बंद कालवा योजनेचे पुढे काय झाले हे दिसत नाही. त्यांना फक्त ‘आम्ही भरपूर पाणीपुरवठा असलेल्या शहरात राहतो,’ या भलत्या ‘अहं’ला कुरवाळत बसायचे आहे.
पाणीटंचाई निर्माण झाली, की सर्वसामान्य नोकरदार वर्गाला रोजचे वेळापत्रक कोलमडण्याची भीती वाटते. याउलट एक वर्ग अतिशय आनंदाने या टंचाईचे स्वागत करतो. हा वर्ग म्हणजे शहरात दिवसेंदिवस फोफावत असलेली टँकर लॉबी. आता ही लॉबी कुणाच्या मालकीची असते, कुणाचे हितसंबंध त्यात गुंतलेले असतात, कुणाला यातून फायदा मिळतो हे पुणेकरांना सांगण्याची आवश्यकता नाही. पुण्याच्या पूर्व भागात म्हणजे खराडी, धानोरी, विमाननगर व लोहगाव या परिसरात गेल्या चार आर्थिक वर्षांत तब्बल १८ हजार टँकरनी पाणीपुरवठा केल्याची बातमी ‘मटा’ने ३ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केली आहे. पूर्व भागातील पाण्याची ही रड खूप वर्षांपासून कायम आहे. त्या परिसरातील टँकरमाफियांचे प्राबल्य लक्षात घेता, पुढील काळातही ही रड कमी होण्याची अजिबात शक्यता दिसत नाही. या भागात गेल्या काही वर्षांपासून प्रचंड प्रमाणात बांधकामे वाढली आहेत. मोठमोठ्या सोसायट्यांना पाण्यासाठी या टँकरवरच अवलंबून राहावे लागते. एकेका सोसायटीचा टँकरवरचा खर्च दर महिन्याला तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत गेला आहे. या परिसरातील सोसायट्यांची संख्या बघता, या व्यवसायातील कोट्यवधी रुपयांची उलाढाल कशी होते, याचा अंदाज येईल. ही केवळ पूर्व भागाची स्थिती आहे, असे नाही. हडपसरपासून धायरीपर्यंत शहराच्या उपनगरांत सर्वत्र हीच कथा आहे. पुण्यातील घरांच्या अव्वाच्या सव्वा किमतींमुळे परवडणाऱ्या घरांची संख्या उपनगरांत अधिक आहे. नागरिक येथे घर तर घेतात; मात्र नंतर पाणीपुरवठ्याच्या एकेक तक्रारी सुरू होतात. नाइलाजाने टँकर मागविण्याशिवाय त्यांना पर्यायच राहत नाही. कोथरूडसारख्या भागात पाण्याची कधी टंचाई नसते, असा एक समज आहे. मात्र, तिथेही काही मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये आता पाण्याची समस्या सुरू झाली आहे. वास्तविक, कोथरूडमध्ये भविष्यात हा प्रश्न आणखी बिकट होत जाणार आहे. याचे कारण सुमारे ४०-४५ वर्षांपूर्वी इथे तयार झालेल्या तीन-चार मजली सोसायट्या आता ‘रिडेव्हलपमेंट’च्या टप्प्याला आल्या आहेत. कोथरूडमध्ये सध्याच प्रचंड प्रमाणात मोठमोठ्या इमारतींची कामे सुरू आहेत. त्यामुळे होणारी धूळ आदी प्रश्न बाजूला ठेवले तरी एवढ्या वाढत्या लोकसंख्येला पुरणारे पाणी महापालिका कोठून आणणार आहे, हा कळीचा प्रश्न बाकी उरतोच.
पुण्याच्या भोवतीने होणारा ८० किलोमीटरचा रिंग रोड, पीएमआरडीएची एकूण विस्तारित हद्द आणि पुण्यात वाढत जाणाऱ्या घरांच्या किमती बघता हे शहर चारही अंगांनी पुढच्या काळात किती विस्तारत जाईल, याची कल्पनाही करता येत नाही. आत्ता साधारण ७० ते ७५ लाख वस्ती असलेले हे शहर पुढच्या १० वर्षांत सव्वा ते दीड कोटींचे अवाढव्य महानगर होईल. या महानगरासाठी पिण्याच्या पाण्याची सध्याची व्यवस्था पुरणार नाही, हे उघड आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात शहरभर करून ठेवलेले सिमेंटचे रस्ते, काचेच्या वाढत्या इमारती, झाडांची घटती संख्या यामुळे येथील हवामान आल्हाददायक मुळीच राहणार नाही. अशा परिस्थितीत पाऊसमान घटल्यास पाण्याची केवढी टंचाई निर्माण होऊ शकेल, हे सांगायला कुणा तज्ज्ञाची आवश्यकता नाही. अशा परिस्थितीत ‘आपल्याकडे पाणी कमी आहे,’ हे महापालिकेपासून ते नागरिकांपर्यंत सर्व संबंधित घटकांनी मान्य करणे आणि आतापासूनच कमी पाण्यात आपल्या गरजा भागविण्याची सवय करणे याला तरणोपाय नाही. याशिवाय सध्या कागदावर जे नियम आहेत (बांधकामांसाठी फक्त ‘एसटीपी’चे पाणी वापरणे इ.) ते पाळले तरी खूप झाले. नदी वाहती ठेवणे, तिची स्वच्छता हे तर आणखी पुढचे विषय आहेत. मात्र, मुळात आहे ते पाणी जपून वापरणे, प्रत्येक घरात वॉटर मीटर बसविणे (आत्ता काही टाउनशिपमध्ये ही व्यवस्था आहे), पाण्यासाठी पैसे मोजण्याची मानसिकता तयार करणे याही गोष्टी कराव्या लागतील.
पाण्याच्या नियोजनाबाबत केवळ अल्पकालीन विचार करून चालणार नाही. या वाढत्या महानगरासाठी पुढील शंभर वर्षे पाणीपुरवठा कसा व्यवस्थित राहील याचा आराखडा युद्धपातळीवर तयार करण्याची आवश्यकता आहे. उपनगरांमध्ये उत्तम दर्जाच्या जलवाहिन्या टाकून, सर्वांना व्यवस्थित पाणी मिळेल असे पाहणे ही मूलत: महापालिकेची जबाबदारी आहे. पुणेकर नागरिक मिळकतकर भरण्यात आघाडीवर असतात. ते आपल्या कर्तव्यात चुकत नाहीत, तर महापालिकेनेही आपली कर्तव्ये नीट पार पाडायला नकोत काय? टँकर लॉबी कायमची बंद कशी होईल, यासाठी येथील कारभाऱ्यांनी मनापासून प्रयत्न केले, तर पुणेकर त्यांच्या पाठीशी कायम उभे राहतील. आता पुणेकरांनी आपल्या अंगचे ‘पाणी’ दाखविण्याची वेळ आली आहे.

---

(पूर्वप्रसिद्धी - ९ एप्रिल २०२४, महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती)

 -----------

29 Apr 2024

चर्चेतील मोहरे

चर्चेतील मोहरे
------------------


१. कंगना रनौट
-----------------

बेधडक ‘क्वीन’
-----------------

 

आपल्या बेधडक-देधडक स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री कंगना रनौट यांना भारतीय जनता पक्षाने हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. गेल्या काही वर्षांपासूनचा कंगना यांचा राजकीय कल पाहिला असता, एक ना एक दिवस सत्ताधारी पक्ष त्यांना याची बक्षिसी देणार, हे दिसतच होते. हिंदी चित्रपटसृष्टीत त्या २००८ पासून सक्रिय आहेत. ‘गँगस्टर’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘तनू वेड्स मनू’ या चित्रपटाने त्यांना खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहातील प्रमुख अभिनेत्रीचा दर्जा मिळाला. ‘क्वीन’ या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाद्वारे त्यांनी झाशीचे राणीचे चरित्र रूपेरी पडद्यावर आणले. कंगना रनौट यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील यश सहज नव्हते. चित्रपटाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून त्या आल्या. हिंदी चित्रपटसृष्टीत चालत असलेल्या घराणेशाहीवर त्यांनी कायमच टीकेचे आसूड ओढले आणि तेथील बड्या धेंडांशी ‘पंगा’ घेतला. अभिनेता हृतिक रोशन याच्याशीही त्यांचे जाहीर वाद झाले. मात्र, कुठल्याही परिणामांची पर्वा न करता कंगना सतत त्यांना जाणवत असलेल्या अन्यायाविरुद्ध बोलत राहिल्या आहेत. गेल्या काही वर्षांत समाजमाध्यमांवर त्या सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्या. आता त्यांनी थेट राजकारणात प्रवेश केला आहे.
कंगना अमरदीप रनौट यांचा जन्म २३ मार्च १९८७ रोजी हिमाचल प्रदेशातील भांबला (आता सूरजपूर) या छोट्या गावी एका राजपूत कुटुंबात झाला. मंडी जिल्ह्यात हे गाव आहे. कंगना यांच्या घरात अभिनयाचा वारसा नसला, तरी राजकारणाचा आहे. त्यांचे पणजोबा सर्जूसिंह हे विधानसभेचे सदस्य होते. त्यांचे आजोबा आयएएस अधिकारी होते. त्यांच्या गावी असलेल्या पिढीजात हवेलीत कंगना यांचे बालपण गेले. नंतर चंडीगड येथील डीएव्ही हायस्कूलमध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्या दिल्लीत आल्या. काही काळ मॉडेलिंग केल्यानंतर त्यांनी अभिनयाकडे लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. दिल्लीत एका नाट्य संस्थेचे हौशी नाटक करताना कंगना यांनी ऐन वेळी न आलेल्या पुरुष नटाचीही भूमिका स्वत:च्या भूमिकेसोबत केली. त्यांच्या या क्षमतेमुळे प्रेक्षक अवाक झाले. त्याच क्षणी त्यांना आपल्यातील अभिनय क्षमतेची खऱ्या अर्थाने जाणीव झाली आणि त्यांनी याच क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचा काळ संघर्षाचा होता. अनेकदा ब्रेड व लोणचे खाऊन कंगना यांनी दिवस काढले. याच काळात स्वाभिमानी स्वभावामुळे वडिलांची आर्थिक मदत नाकारण्याच्या निर्णयामुळे त्यांचे कुटुंबीयांशीही संबंध दुरावले. अखेर बऱ्याच वर्षांनी कंगना हिंदी चित्रपटसृष्टीत स्थिर झाल्यानंतर घरच्यांशी पुन्हा संबंध प्रस्थापित झाले.
कंगना यांची राजकीय मते तीव्र आहेत. त्यांनी कायमच भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने आक्रमकपणे खिंड लढविली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना कंगना यांनी सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी त्या सरकारवर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने पूर्वीची एक नोटीस जारी करून कंगना यांच्या घराचे कथित बेकायदेशीर अतिक्रमण पाडले होते. नंतर मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या विरोधात निकाल दिला होता आणि कंगना यांना भरपाई देण्याचाही आदेश दिला होता.
कंगना यांच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा अध्याय आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झाला आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही विरोधकांनी ‘मंडी’ या शब्दावरून त्यांच्यावर अश्लील व विखारी टीका केली होती. कंगना यांनी त्यांच्या स्वभावाच्या विपरीत असे संयमित उत्तर विरोधकांना दिले होते. आता त्या ही निवडणूक जिंकतात का आणि जिंकल्यावर लोकसभा कशी गाजवतात याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

 ----------

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; १८ एप्रिल २०२४)

-------

२. बांसुरी स्वराज

-----------------------------

नव्या ‘स्वराज’
--------------------------

भारतीय जनता पक्षाच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. सध्याच्या खासदार मीनाक्षी लेखी यांच्या जागी त्यांना या मतदारसंघातून भाजपच्या पहिल्या यादीतच उमेदवारी जाहीर झाली. अत्यंत लोकप्रिय आणि विद्वान अशा आईचा वारसा चालविण्याची मोठी जबाबदारी बांसुरी यांच्यावर आली आहे. सुषमा स्वराज यांचे २०१९ मध्ये अकाली निधन झाले, तेव्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार दुसऱ्यांदा केंद्रात सत्तारूढ झाले होते. नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सुषमा स्वराज यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून धडाकेबाज काम करून दाखवले होते. त्यापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदापासून ते केंद्रात आरोग्य, माहिती व प्रसारण अशा विविध खात्यांचा अनुभव त्यांना होता. उत्तम वक्त्या म्हणून त्यांचा नावलौकिक होता. बांसुरी यांची आतापर्यंतची कारकीर्द बघता, त्या आपल्या आईचा हा वारसा निश्चितपणे पुढे नेतील, असे वाटते. बांसुरी आता अवघ्या ४० वर्षांच्या आहेत. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. सध्या त्या सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात. कायद्याचे शिक्षण घेण्याआधी त्यांनी ब्रिटनमधील वार्विक विद्यापीठातून इंग्लिश साहित्याचीही पदवी घेतली आहे. हरियाणा सरकारच्या अतिरिक्त महाधिवक्ता म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सन २००७ पासून त्या वकिलीची खासगी प्रॅक्टिसही करतात. गेल्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. भाजपच्या कायदा शाखेच्या सहनिमंत्रक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. आपल्यावर आईचा मोठा प्रभाव असल्याचे त्या सांगतात. ‘मी गेल्या जन्मी नक्की काही तरी मोठे पुण्य केले असणार, म्हणून या जन्मी सुषमा स्वराज यांच्यासारख्या आईच्या पोटी जन्माला आले,’ असे त्यांचे उद्गार आहेत. सुषमा स्वराज या श्रीकृष्णाच्या निस्सीम उपासक होत्या. त्यांना आपल्या कन्येचे नाव एखाद्या वाद्यावरून ठेवायचे होते. श्रीकृष्णाची बासरी प्रसिद्ध, म्हणून त्यांनी आपल्या कन्येचे नावही ‘बांसुरी’ असे ठेवले.
बांसुरी यांच्याकडे सुषमा स्वराज यांचा राजकीय वारसा आपोआप आला असला, तरी त्यांना स्वत:ला आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठीची पहिली परीक्षा म्हणजे ही लोकसभा निवडणूक असेल. सुषमा स्वराज यांची लोकप्रियता बांसुरी सध्या अनुभवत आहेतच. मतदारसंघात त्या ज्या ज्या ठिकाणी जातात, तेथे सर्वसामान्य लोक पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करताना दिसतात. त्यांच्या मतदारसंघातील नागरिक बांसुरी यांच्यात सुषमा स्वराज यांना बघत आहेत, हे निश्चित. बांसुरी यांच्याकडे बघितले तरी अनेकांना सुषमा यांचा भास होतो. सध्या प्रचार सभेत बांसुरी ‘सुषमा स्वराज के संस्कारों के साथ हूँ, आजमाके देखो, करके दिखाऊंगी’ असे आवाहन करताना दिसतात.
नवी दिल्ली मतदारसंघ म्हणजे एकदम हाय-प्रोफाइल मतदारसंघ. सुमारे १५ लाख मतदार येथे आहेत. या मतदारसंघात करोलबाग, पटेलनगर, मोतीनगर, दिल्ली कँटोन्मेंट, राजेंद्रनगर, नवी दिल्ली, कस्तुरबानगर, मालवीयनगर, आर. के. पुरम, ग्रेटर कैलाश या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. हा सगळा दिल्लीचा मध्यवर्ती आणि व्हीआयपी भाग आहे. या मतदारसंघाला बांसुरी स्वराज यांच्यासारखी उच्चशिक्षित लोकप्रतिनिधीच हवी, असे येथील अनेक मतदारांचे म्हणणे दिसले. बांसुरी यांचा सामना आम आदमी पक्षाचे सोमनाथ भारती यांच्याशी आहे. मात्र, सुषमा स्वराज यांच्या लोकप्रियतेची पुण्याई बांसुरी यांच्या मदतीस धावून येईल, असे सध्याचे चित्र आहे.

-------


(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; २९ एप्रिल २०२४)

----

28 Mar 2024

अक्षरधारा दिवाळी अंक २३ लेख - भाग २

‘हास्यजत्रा’ हेच जगणं...
---------------------------------------------------------

- सांगतोय समीर चौघुले


रसिकहो, नमस्कार! अक्षरधाराच्या दिवाळी उपक्रमात आपलं स्वागत आहे. आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेछा! यंदाच्या अंकामध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा या सोनी मराठीवरच्या धमाल, विनोदी आणि लोकप्रिय अशा कार्यक्रमाच्या काही कलाकारांबरोबर आज आपण गप्पा मारणार आहोत. आणि या कार्यक्रमातील सर्वांत महत्त्वाचा अभिनेता आणि लोकप्रिय स्किटस्टार समीर चौघुले यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. 

श्रीपाद ब्रह्मे : समीर नमस्कार!

समीर चौघुले : नमस्कार!

श्रीपाद ब्रह्मे : खरं तर तुला समीरदादा म्हणायला हवं! हे विशेषण त्याला सर्वच बाबतीत लागू आहे असं मी म्हणेन. कारण तो लेखक आहे, अभिनेता आहे आणि त्याने ‘हास्यजत्रे’चा शो एकहाती पेलतोय. अर्थात हे टीमवर्क आहे हे तो सांगेलच. कलाकार आहे, दिग्दर्शक आहे पण… हा पणही महत्त्वाचा आहे कारण या पण नंतरही समीर चौघुले बरेच उरतात. तर समीर खूप खूप स्वागत आहे आणि दिवाळीच्या शुभेछा देतो. 

समीर चौघुले : खूप खूप शुभेछा!

श्रीपाद ब्रह्मे : हास्यजत्रा ही नशा आहे, असं मी म्हणतो. प्रेक्षकांना ही नशा आहे तर ती सादर करणाऱ्याला किती असेल! काय आहे ही नशा?

समीर चौघुले : तुमच्यासाठी नशा असेल, आमच्यासाठी जगणं आहे ते! दिवसरात्र ‘हास्यजत्रा’ आमच्या डोक्यात असते. एखादा कार्यक्रम तुमच्या आयुष्यात असा येतो, की तुमच्या आयुष्याला खूप मोठी कलाटणी मिळून जाते. हा तो कार्यक्रम आहे. ज्याला प्रेक्षकांचा आश्रयसुद्धा मिळाला, फार मोठमोठ्या कलाकारांनी वाहवा पण केली. असा एखादाच कार्यक्रम असतो, की जो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतो. आत्ता आम्ही अमेरिकेचा दौरा केला, इतर ठिकाणी दौरे केलेत तिथे आम्ही विस्मयचकित होतो, की हा एवढा कार्यक्रम कसा पोहोचू शकतो! तर त्यामुळेच ‘हास्यजत्रा’ आमचं जगणं आहे. खाताना, झोपतानासुद्धा आमचा दुसरा मेंदू सतत ‘हास्यजत्रे’चाच विचार करत असतो. तुम्ही जे मघाशी म्हणालात की मी एकहाती सगळं पेलतो, तसं खरंच नाहीय. कुठलाही कार्यक्रम एक माणूस तारून नाही नेऊ शकत. ते टीमवर्कच असतं. मी मनाचा मोठेपणा दाखवून बोलतोय असं काही नाहीये, कारण दॅट्स अ फॅक्ट! कारण ‘हास्यजत्रे’चे सातशे एपिसोड ही खूप कठीण गोष्ट आहे आणि जी मी रोज अनुभवतो. म्हणजे एक परफॉर्मन्स झाल्यावर, सई-प्रसादने कौतुक केल्यावर तो विषय तिथेच संपतो. आम्ही त्या सोफ्यावर जाऊन बसतो आणि पुढचा विचार येतो. प्रसाद खांडेकर म्हणतो, ‘अरे, उद्या काय करायचं? उद्या पाटी कोरी आहे आपली.’ कारण दर वेळेला तुम्हाला एक पायरी चढायचीच असते. ‘हास्यजत्रा’ लोकांना एवढं आवडतंय, त्याचं एवढं नाव झालंय, की एक पायरी खाली नाही येऊ शकत तुम्ही. निदान तुम्हाला त्या पायरीवरच राहावं लागतं किंवा एक पायरी वर जायला लागतं. या ज्या अपेक्षा असतात ना त्याचं खूप मोठं प्रेशर असतं. आम्ही खूप जबाबदार झालो आहोत त्यामुळे. ‘हास्यजत्रे’ने लोकांची आयुष्यं बदललीयेत. जेव्हा तुम्ही खरंच लोकांची आयुष्यं बदलता, तेव्हा जबाबदारीही वाढते. अनेक लोकांच्या आयुष्यात खूप नैराश्य आलेलं असतं, तेव्हा ते लोक ‘हास्यजत्रे’कडे एक उपाय म्हणून बघतात. अनेक कॅन्सर पेशंट, आत्महत्येचा विचार करणाऱ्या अनेक लोकांना ‘हास्यजत्रे’ने थांबावलेलं आहे. तशी पत्रं आलेली आहेत आमच्याकडे! अशी पत्रं जेव्हा आमच्यापर्यंत पोहोचतात तेव्हा आम्ही कलाकार, आमची कोअर टीम हाच विचार करत असते, की हे सोपं नाहीये. यासाठी खूप जास्त मेहनत केली पाहिजे. काल आम्हाला इथे  शब्दश: रात्रीचे दीड-दोन वाजले. सकाळी पाच वाजता उठलो. दोन तास झोपलो. जे स्क्रिप्ट मला थोडं कच्चं वाटत होतं ते लिहिलं. आणि आज ते उत्तम झालं. त्यामुळे मी रिलॅक्स झालो. हा आनंद मी तुम्हाला नाही सांगू शकत, की तो काय असेल! तर ही अशी ती गंमत आहे. 

श्रीपाद ब्रह्मे : ‘हास्यजत्रा’ बाकी सर्व विनोदी कार्यक्रमांपेक्षा वेगळी कशी ठरते? 

समीर चौघुले : आम्ही सर्व जण आधी ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ नावाचा कार्यक्रम करायचो. सत्तर टक्के हीच टीम होती. आम्ही हेच काम करायचो. पण त्याचे चारशे-साडेचारशे एपिसोड झाल्यावर, आपण एखादी गोष्ट रोज केल्यानंतर, काय केल्यानंतर ते इफेक्टिव्ह होईल, लोकांना काय आवडेल याचे ठोकताळे आम्हाला कळायला लागले. त्यानंतर मध्ये एक-दोन वर्षांची गॅप गेली आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आली. तेव्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ करताना याआधी आम्ही केलेल्या सर्वं चुकांचं आम्ही त्रैराशिक मांडलं. आमच्या लक्षात आलं, की जर आपण लोकांना सीट-कॉम (सिच्युएशनल कॉमेडी) दिलं, जिथे कोणा एकाला हीरो न करता सिच्युएशन हाच हिरो असेल, स्किट हिरो असेल! आणि ते आमच्या डोक्यातून बिलकुल खाली पडू देत नाही आम्ही. आणि म्हणूनच स्किटचे विषय लोकांना खूप आपलेसे वाटतात. ठेच लागत लागतच आम्ही सगळं शिकत गेलो. वाईटातून चांगलं होणं असं जे म्हणतात ते आमच्या बाबतीत करोनामुळे झालं. करोनात आजूबाजूला इतकं नैराश्य होतं, त्या काळात ‘हास्यजत्रे’ने लोकांसाठी नवसंजीवनीसारखं काम केलं आहे. जेवढी लोकप्रियता करोनाकाळात ‘हास्यजत्रे’ला मिळाली तेवढी आधी नव्हती. अनेक ठिकाणी ‘लाफ्टर थेरपी’ म्हणून हास्यजत्रेची स्किट्स दाखवली आहेत. संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ दरम्यान अनेक कोव्हिड सेंटरमध्ये स्क्रीन्स ‘सोनी मराठी’ने पुरवली आहेत. ‘सोनी मराठी’ने खूप मोठं काम केलंय या काळात. प्लाझ्मा आणि एलसीडी पुरवल्यात अनेक कोव्हिड सेंटरमध्ये. माणसं हसली की ती लवकर बरी होतात, हा वैज्ञानिक नियम आहे. हे कार्य नकळतपणे घडत गेलं, मुद्दाम ठरवून नव्हतं केलेलं! प्रामाणिकपणे या सर्व गोष्टी आम्ही आमच्या परीने करत गेलो. पहिल्या महायुद्धानंतरही असंच झालं होतं. त्या काळात प्रचंड गरिबी होती, दु:ख होतं. अशा परिस्थितीत चार्ली चॅप्लिनने जगाला हसवलं. तो फाटका होता म्हणून तो आपलासा वाटला. तो श्रीमंत, राजबिंडा असता तर तो आपल्यातला वाटला नसता. विशाखा आणि मी जे ऑफिसचं स्किट करायचो, तेव्हा अनेक एम्प्लॉईजना मनात असतं, की आपल्या बॉसला उत्तर द्यायचं; पण त्या हुद्द्यामुळे उत्तर देऊ शकत नव्हतो, पण त्याला मी एक वाट करून दिली. त्यामुळे लोकांना ते विषय आपलेसे वाटतात. लोकांनी जे सहसा अनुभवलेलं असतं तेच त्यांना जास्त रिलेट होतं आणि हाच फॉर्म्युला आम्ही तिकडे ‘हास्यजत्रे’त वापरतो. मी एक स्किट केलं होतं, त्यात एक लग्नाची पंगत असते. त्यात मला खायला काही मिळतच नाही शेवटपर्यंत. हे असं प्रत्येकाच्या बाबतीत झालेलं आहे. माझ्या मते हीच खासियत आहे ‘हास्यजत्रे’ची! हा एकमेव कार्यक्रम असा आहे, की दोन-तीन पिढ्या एकत्र मिळून हा कार्यक्रम बघतात. हे फार मोठं काम आहे आजच्या घडीला असं मला वाटतं. आम्ही जेव्हा अमेरिकेत गेलो होतो, तेव्हा एक बाईने मला सांगितलं, की तिच्या मुलाने जो इंग्लिश माध्यमात शिकतो, त्याने तिला विचारलं की, 'ममा व्हॉट डू यू मीन बाय संभ्रमात?' माझ्या डोळ्यात पाणीच आलं त्यामुळे.’ हास्यजत्रेमुळे मुलं मराठी बघू लागली जी मुलं आधी फक्त इंग्लिश सीरीजच बघायची, ती मुलं आता त्यांना अडलेल्या मराठी शब्दांचे अर्थ त्यांच्या पालकांना विचारू लागली. आणि हे सगळं नकळतपणे ‘हास्यजत्रे’मुळे होतंय याचा आम्हाला आनंद आहे. लोकांच्या अपेक्षा वाढत गेल्या म्हणून आम्ही तेवढे जबाबदार झालो आहोत. या सर्व गोष्टींमागे प्रेक्षक आहेत.

श्रीपाद ब्रह्मे : ‘हास्यजत्रा’मधला विनोद निखळ आहे किंवा निर्विष आहे, असं म्हणू या. हा विनोदाचा दर्जा तुम्ही कसा टिकवता?

समीर चौघुले : याबाबत मला सर्वांत जास्त आभार मानायचे आहेत अजय (भाळवणकर) सरांचे. त्यांचं सुरुवातीपासूनच म्हणणं होतं, की हा शो आपल्याला कुटुंबासाठी करायचाय. स्किट सर्व कुटुंबाला एकत्र बघता आले पाहिजेत. त्यात कोणाला ऑकवर्ड नाही वाटलं पाहिजे. कमरेखालचे विनोद करणं किंवा द्व्यअर्थी विनोद करणं खूप सोपं असतं. निर्विष आणि निखळ विनोद करणं कठीण असतं. ते आव्हानात्मक आहे, त्यामुळे ते करण्यात जास्त मजा आहे. तुम्ही मग आखून दिलेल्या वर्तुळाच्या बाहेर निघायचा सतत प्रयत्न करत राहता आणि त्या प्रयत्नांमधून चांगल्या गोष्टी घडतात. आमच्या टीमचा सतत तोच प्रयत्न असतो. काल जे झालं ते आज नाही करायचं. आज जे झालं आहे ते उद्या नाही करायचं, असं डोक्यात सतत चालू असतं. आमची जी दोन विद्यापीठं आहेत - गोस्वामी सर आणि मोटे सर - त्यांचा वचक असतो. काय करायचं नाही हे प्रकर्षाने सांगितलं जातं. ‘सहकुटुंब हसू या’ - ही जी आमची टॅगलाइन आहे - तसाच प्रयत्न आमचा चालू असतो. 

श्रीपाद ब्रह्मे : स्किट करताना कोण जास्त वरचढ असतं? तुझ्यातला लेखक की तुझ्यातला अभिनेता?

समीर चौघुले : आता जिथे लेखक कमी पडतो तिथे माझ्यातला अभिनेता धावून जातो मदतीला. नाही तर या दोन्ही गोष्टी पूरक असतात. लेखक म्हणून कधी कधी सुचत नाही ते अभिनेता म्हणून ‘ऑन द स्पॉट’ सुचतं. मी अभिनेता बाय प्रोफेशन आहे आणि लेखक बाय चॉइस आहे. मराठी लेखनात पैसा नाहीय; मात्र समाधान खूप आहे. पैसा नाही याची खंत आहेच. मी जे लिहीन त्याचा आनंद मला मिळाला पाहिजे. सुचणं हा प्रकार मला मी लेखक झाल्यापासून झाला. त्याच्यामागे अनेक वर्षं मी काम करतोय. २९ वर्षं मी काम करतोय. पाच हजार प्रयोग केलेत नाटकांचे. नाटकांच्या प्रयोगांनी मला खूप घडवलं. ‘यदाकदाचित’ नावाचं नाटक होतं त्याचे मी जवळजवळ तीन हजार प्रयोग केले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केले आहेत. कधी कधी माइक बंद असतात. मध्येच एका माइकचा स्फोट झाला, साप आला, बैल घुसले… हे सगळं मी अनुभवलेलं आहे. तर त्यातून मी खूप तावून-सुलाखून निघालो. मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला, की नाटक पहिल्यांदा माझ्या आयुष्यात आलं. मी नेहमी हे सांगत असतो, की नाटक तुम्हाला अलर्ट ठेवतं. नाटक हे ना एखाद्या नागमोडी वळणासारखं असतं. पुढे काय होईल हे त्या वेळेला नाही सांगत येत. पाचशेव्या प्रयोगाला तुम्ही ब्लॅंक होऊ शकता. मी स्वतः झालेलो आहे. म्हणून तर त्याला ‘प्रयोग’ म्हणतो आपण. आयुष्यात नाटक आल्याने ना माझी तयारी खूप झाली. मग पुढे चंद्रकांत कुलकर्णी, माझे गुरू विश्वास सोहोनी, सचिन मोटे-सचिन गोस्वामींसारख्या दिग्दर्शकांबरोबर कामं केली. आणि त्यांनी माझ्यातल्या लेखकावर विश्वास ठेवला. निर्मिती सावंतमुळे खरं तर मी लेखक झालो. म्हणजे अगदी ऑफिशियली असं म्हणता येईल. एक मालिका होती ‘सतराशे साठ सासूबाई’ नावाची. त्यांना अर्जंट लेखक पाहिजे होता. मी अंग काढून घेत होतो, कारण मी मूळचा लेखक नाहीये. ते म्हणाले, ‘कर, तुला  येईल.’ मग त्याचे मी साडेतीनशे एपिसोड लिहिले. खरं सांगू, मला कोणी तयार केलं? अनेक कार्टून चॅनेल्स, जसं की निक (निकलोडिअन) - तर मी अनेक लहान मुलांच्या सीरियल्स लिहिल्या. कुरोचॅन, ऑगी अँड द कॉक्रोचेस, शिनचॅन मी लिहिलेली आहे जवळजवळ वर्षभर. अशा अनेक सीरियल मी दीड-दोन वर्षं लिहिल्यात. लहान मुलांचा विनोद खूप कठीण असतो करायला. तर या सगळ्यामुळे माझं लेखन खूप समृद्ध झालं. इतक्या वर्षांचा तो परिपाक आहे. एका रात्रीत सगळं आलं असं नाहीये ते. 

श्रीपाद ब्रह्मे : कधी असं झालंय का की दुसऱ्या एखाद्याने लिहिलेलं स्किट तुला पटत नाहीय किंवा तुला ते कन्व्हिन्स होत नाहीय?

समीर चौघुले : तसं नाही होत बिलकुल. पण कधी तरी तसं होऊ शकतं. काही काही स्किट्समध्ये असं होतं, की नाही अरे, समथिंग इज राँग! काल रात्री आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत मीटिंगमध्ये चर्चा करतो होतो, की हे ना कुठे तरी चुकतंय. हे आम्हाला माहीत होतं. मी कम्फर्टेबल नव्हतो, की सर, आपण हे नको करू यात. सर पण म्हणाले नको करू या. मग दुसऱ्या दिवशी सरांनी सांगितलं, की हे असं करून बघ, तसं करून बघ. हे आमचं सातत्याने चालू असतं. पहाटे लवकर उठून मी माझ्या मनासारखं लिहून घेतो. बऱ्याच वेळेला असं होतं की मला माझं स्किट लिहिताना माहीत असतं, की मी काय लिहिणार आहे, काय करणार आहे. म्हणजे बऱ्याचदा लोकांना कळत नाही, यात काय हसण्यासारखं! पण लिहिताना ते माझ्या डोक्यात असतं. डोअर फ्रेममध्ये कित्येकदा मी जिना चढून जातो, असं केलेलं आहे; पण अनोळखी व्यक्तीला ते वाचताना कळत नाही. स्क्रिप्टचं वाचन चालू असतानासुद्धा असं वाटतं, की हे बरोबर नाहीये. लिहिताना ते बरोबर वाटलं होतं. काही तरी चुकतंय. सूर चुकतोय कुठे तरी, असं वाटत राहतं. स्किट करताना हा सूर खूप महत्त्वाचा असतो. तो सूर चुकला ना की पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे सगळं स्किट कोसळतं. हे मी अनुभवलेलं आहे अनेकदा. यशापेक्षा अपयश जास्त बघितलंय. स्किट पडताना काय होतं हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. पंधरा मिनिटं जरी असले तरी त्यामागे काही तास सुचायला लागलेले असतात. 
रिहर्सल असते तासन् तास. त्यामुळे एखाद्या अपत्याप्रमणे आम्ही त्याला वागवतो. ते नाही नीट झालं तर मी खूप नर्व्हस होतो. स्किट चांगलं झालं पाहिजे हाच विचार असतो सतत डोक्यात. जोपर्यंत एखादं स्किट मला पटत नाही  तोपर्यंत मी ते ‘ओके’ करायला पाठवत नाही. मीच कन्व्हिन्स नसेन तर मी कसा हसवणार ना तुम्हाला? मी शंभर टक्के कन्व्हिन्स असेन तर मी तुम्हाला हसवीन. मला ते आधी पटलं पाहिजे. आणि विनोद तसाच असतो. तो आधी स्वतःला पटावा लागतो. मला जर पक्का कळला ना, तर मी माझ्या स्किलने तो तुमच्यापर्यंत पोचवणार. मराठी प्रेक्षक प्रचंड सुजाण असतो. त्यामुळे तुम्ही फसवू नाही शकत त्यांना. 

श्रीपाद ब्रह्मे : हल्ली समाज खूप असहिष्णू झालाय. लोकांना लगेच रिॲक्ट करायची सवय झालीये. तर याचा लेखक म्हणून ताण येतो का, की लेखक म्हणून काही गोष्टी आपल्याला लिहिता येत नाहीत?

समीर चौघुले : प्रचंड ताण येतो. कुंपण हळूहळू आकुंचित व्हायला लागलंय. लेखन दिवसेंदिवस कठीण होत चाललेलंय. कोणाची कधी काय भावना दुखावेल, याला काही लिमिटच राहिलेली नाहीये. एका स्किटमध्ये मी एक वाक्य घेतलं, 'मी हुशार होतो ना म्हणून मी सायन्सला गेलो. हा पश्या ढ होता म्हणून तो आर्ट्सला गेला.' तर मला कित्येक आर्ट्सच्या मुलांचे मेसेज यायला लागले, की आर्ट्सची ढ असतात का म्हणून? तुम्ही हे तुम्हाला का लावून घेता? हा पश्या ढ होता म्हणून तो आर्ट्सला गेला, असं म्हणतोय मी. काय झालंय, की प्रत्येक गोष्ट स्वतःला लावून घेण्याची सवय लागलीये लोकांना. मी नेहमी सांगतो की ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये पु. ल. देशपांडे यांनी जी साक्ष केलेली आहे ती लिहून दाखवावी कुणी तरी. माझी तीन दैवतं आहेत -  पु. ल. देशपांडे, चार्ली चॅप्लिन आणि रोवन ॲटकिन्सन - ज्याने मिस्टर बिन साकारला आहे तो. ही तीन माझी दैवतं आहेत. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातसुद्धा अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या आत्ता तुम्ही नाही लिहू शकत. आणि ट्रोलिंग हे फुकट झालं आहे. सहजपणे ट्रोल केलं जातं सोशल माध्यमामुळे. त्यामुळे आता आम्ही असं ठरवलंय, की ट्रोलर्सचं आम्ही वाचत नाही. एखाद्या  कामाविषयी काही सूचना आल्या, आम्हाला पटल्या तर आम्ही त्याचा नक्कीच स्वीकार करतो, कधी कधी माफीही मागतो. मागे एकदा आलं होतं की मजा येत नाहीय. म्हटलं ठीक आहे; आम्ही जास्त प्रयत्न करू; पण तुमच्या या अभिप्रायाबद्दल खरंच आभार! सरांपासून सगळे आम्ही हे फॉलो करतोय. तुम्ही टीका केलीत तुम्हाला काय कळतंय असं आम्ही करत नाही ते प्रेक्षक आहेत. ते टीव्ही लावतायत म्हणून आज हे सगळं चालतंय. पण एका ठरावीक मर्यादेनंतर मग आपल्याला कळतं, की हे ट्रोलिंग आहे ते. काही विशिष्ट माणसं सातत्याने ट्रोलिंग करतात तुम्ही कितीही काहीही करा .मग आम्ही अशा माणसांकडे सरळ दुर्लक्ष करतो. ते सोपं आहे आमच्यासाठी. त्यामुळे मी म्हटलं तसं कोणाचं काय होईल काही सांगता येत नाही. लोक म्हणतात सतत तुमच्यावरच विनोद केले जातात, कारण दुसरीकडे करणंच बंद झालेलंय आता. कशावर करणार? ना धार्मिक, ना राजकीय! कोणावरच करू शकत नाही. मग उरले कोण? समीर चौघुले! करा माझ्यावर विनोद! माझ्या दैवतांनीसुद्धा हेच सांगितलंय, दाखवून दिलंय की स्वतःवर केलेला विनोद हा जगातला सर्वश्रेष्ठ विनोद असतो. चार्ली चॅप्लिनच्या गोल्ड रश  सिनेमात ते बूट भाजून खातात असं दाखवलं आहे. हा किती मोठा पॅथॉस आहे! कारण त्या काळी खरंच खायला अन्न नसायचं. हा एवढा मोठा पॅथॉस विनोदाच्या माध्यमातून त्यांनी पोचवला. आर. के. लक्ष्मणांचं  ‘यू सेड इट’ यायचं, ते मला खूप आवडायचं. मिस्टर बिन पण आत्ताच्या जनरेशनला आवडतोय. तो पण तेच करतो. तो गडबड- गोंधळ करतो, तो बावळट आहे म्हणून तर तो आपल्याला आपल्यातला वाटतो ना. कारण मला असं वाटतं की सीमारेषा आहेत, त्यामधनं काम करणं कठीण होतंय; पण कुडीत जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत करत राहणार विनोद. दुसरं काय करू शकतो? 

श्रीपाद ब्रह्मे : आता पाच वर्षं झाली तुमच्या कार्यक्रमाला. तर अशा कार्यक्रमाचं आयुष्य किती असू शकतं असं तुम्हाला वाटतं?

समीर चौघुले : आता ते प्रेक्षकांच्या रुचीवर आहे आणि त्यांच्या अभिरुचीवर आहे असं मला वाटतं. पण दिवसेंदिवस हे करणं मात्र खूप कठीण होत चाललेलं आहे. कारण शेवटी विषय संपतात ना! तसेच विषय केले की ते तसेच रिपीट केल्यासारखे वाटतात. आंबे आपल्याला का आवडतात, कारण ते फक्त मे महिन्यात येतात. आंबे प्रत्येक महिन्यात यायला लागले तर त्याचं नावीन्य कमी होईल. त्यामुळे ते जेवढं कमी असेल तेव्हढं त्याचं आयुष्य वाढेल असं मला वाटतं. आता सध्या मी ‘फोर डेज अ वीक’ करतोय, पण दमछाक करणारं आहे. त्याचं आयुष्य किती आहे हे मला माहिती नाही. पण अजूनही आजतागायत लोकांचं चांगलं प्रेम मिळतं आहे. दुसरं असं, की सध्या सगळ्यांच्याच आयुष्यात ताण अतिशय वाढलाय. आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो, की आम्हाला लगेच कौतुक मिळतं. तुम्ही एकोणीस तास मेहनत केलीत आणि त्याचं कौतुक झालं, की माणूस मानसिकदृष्ट्या खूप शांत होतो. आमच्या आयुष्यात ‘हास्यजत्रा’ आली, त्याचे खूप आभार आम्ही मानतो.

श्रीपाद ब्रह्मे : ‘लोचन मजनू’चं कॅरक्टर डेव्हलप कसं केलंस?

समीर चौघुले : नाना पाटेकरांनी मध्ये मला फोन केला होता. त्यांनी सांगितलं होतं, की असा निवेदक पुण्यात आहे. खोटं बोलू नकोस, चोरलंयस तू! मी म्हटलं त्यांना, की चोरलं वगैरे काही नाहीय. काय झालं, हे पात्र विकसित करताना मी सुचवलं, की तो तसं बोबडं बोलेल. मी सरांना म्हटलं, मी वेगळं करून बघतो. कदाचित काही तरी मिळेल. मग त्याचं कारण आहे, की तो असं का बोलतो? मग तो एक एलिमेंट मिळत गेला. त्याची मजापण आली, की हा असं का बोलतोय? यातल्या विनोदांसाठी अनेकदा ट्रेंडिंग रील्सचाही आम्ही वापर करत असतो. ‘मधुमास’ गाण्याच्या वेळची धमाल त्यातूनच आलीय.

श्रीपाद ब्रह्मे : रोजच्या जगण्यातले अनुभव स्किटसाठी कसे उपयोगाला येतात? कशी असते ती प्रक्रिया?

समीर चौघुले : असे प्रसंग टिपण्याचा डोळा आमच्याकडे तयार झालाय. आम्हाला आलेले विविध अनुभव आम्ही लोकांसमोर मांडतो. फॅन्स जेव्हा फोटो काढायला येतात, तर काहींचा फोटो टायमर १५-२० सेकंद असतो. इतका वेळ लाफ्टर नाही होल्ड करता येत! अनेक वेळा काय होतं, की नवरा-बायको येतात आणि त्यांच्या अचानक लक्षात येतं, की स्टोरेज फुल्ल! मग म्हणतात, नको जाऊ दे! त्यांना काही वाटत नाही, की समोरच्याचा आपण अपमान करतोय. आता त्याच्यावर काय बोलणार आपण? असे अनेक अनुभव आहेत. कधी कधी पासवर्डच विसरतात आणि आम्ही तिथे थांबलोय ते कधी फोटो काढतायत याची. हेच अनुभव तुम्हाला ‘हास्यजत्रे’त दिसतात, जे तुम्ही केलेलं असतं किंवा बघितलेलं असतं. दोन महिन्याची सुट्टी देतं चॅनेल आम्हाला. आम्ही माणसांत फिरतो. लग्न अटेंड करतो. लग्नात तर खूप किस्से मिळतात. ती बाई कशी चालतेय, तिचा आवाज कसा आहे, तिचा नवरा आणि तिचे रिलेशन कसं आहे... हे सगळं आम्ही बघत असतो. पु.लं.नी तेच सांगितलंय की जेवढी तुमची निरीक्षणशक्ती जास्त, तेवढी तुम्हाला विसंगती दिसायला लागते. आमच्या कोअर टीमला ती विसंगती टिपायची सवय झालीय. विशाखा आणि माझी जोडी लोकांना आवडण्यामागे, ही जोडी ओबडधोबड होती हेच कारण आहे. त्यात विसंगती आहे, खडबडीतपणा आहे, खरखरीतपणा आहे त्या जोडीमध्ये. दोघेही एकमेकांना विरुद्ध आहेत; पूरक नाहीयेत. त्यामुळे ती जोडी बघायला मजेशीर वाटतं. 

श्रीपाद ब्रह्मे : विनोदी अभिनेता, लेखक म्हणून तू कुठली पुस्तकं जास्त वाचतोस?

समीर चौघुले : माझी भगवद्गीता काय आहे सांगू का? - 'व्यक्ती आणि वल्ली.' एका अभिनेत्याला हे पुस्तक पाठ पाहिजे, असं मला वाटतं. आधी व्यक्ती आणि वल्ली पुस्तक वाचायचं, त्यानंतर पु. लं.चं कथाकथन ऐकायचं अशी मी सुरुवात केली. त्यात तुम्हाला कळून जातं काय आहे ते! मी स्वतःला भाग्यवान समजतो, की मी पु. लं.ची दोन मोठी नाटकं केली आहेत. एक म्हणजे वाऱ्यावरची वरात, जे श्रीकांत मोघेंनी बसवलं होतं. आणि मी श्रीकांत मोघेंनी केलेले रोल केले होते. मग त्यात कडवेकर मास्तर आहे, शिरप्या आहे - जो ‘दिल देके देखो’ नाचतो ते आणि ‘परोपकारी गंपू’ केलाय ‘व्यक्ती आणि वल्ली’त. त्यामुळे पु. ल. देशपांडे यांचं लेखन माझ्यासाठी भगवद्तगीता आहे, बायबल आहे. त्यांचा विनोद मला खूप आकर्षित करून गेला. मी अचंबित व्हायचो लहानपणी की हे एका माणसाला कसं जमू शकतं. ‘गुळाचा गणपती’ तर सबकुछ पु. लं. देशपांडे! ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये जो सुरुवातीचा सीन आहे, जिथे त्याचं स्वागत होतं, आणि सगळे 'स्वागत करू या सकलजनांचे' म्हणत सगळे त्यांची विकेट उडवत असतात. आणि त्यावर पु. लं.च्या रिॲक्शन्स बघा. तिकडे मी अभिनेता म्हणून मी पु.लं. कडे खूप आकृष्ट झालो. ॲक्टिंग सगळेच करतात, पण रिॲक्शन देणारा विनोदात खूप मोठा असतो. ‘गुळाचा गणपती’ बघितल्यावर तर मी गुळासारखा चिकटलो त्या लेखकाला. त्यांची एकेक पुस्तकं बघा. शाळेत असल्यापासून पारायणं केलीत या सगळ्या पुस्तकांची. ‘सुंदर मी होणार’सारखं नाटक त्यांनी केलं कसं? त्यांनी रूपांतर केलं असेल, मग यासाठी आधीचं मूळ नाटक वाचा, पिक्चर आलाय तो चित्रपट बघा. ‘माय फेअर लेडी’ बघा, त्यावरून केलेलं एक नाटक आहे ते बघा. हा अभ्यास प्रत्येक लेखकाने केला पाहिजे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की या सगळ्या स्टेशनांवर उतरत उतरत ‘हास्यजत्रे’च्या स्टेशनवर आलो आहे. इंडस्ट्रीत येताना नेहमी शटलने आलं पाहिजे. बुलेट ट्रेनसारखे नको. नेहमी या एकेका स्टेशन्सवरून यायला पाहिजे. मला शिरीष कणेकरांनी पण खूप आकृष्ट केलं. ते खूप कनेक्टेड होते. ते ‘हास्यजत्रा’ बघायचे. त्यांनी स्वतःहून मला फोन केला होता. तेव्हापासूनचा मी त्यांचा फॅन आहे. क्रिकेट माझा धर्म आहे. फटकेबाजी, फिल्लमबाजी ही सगळी पुस्तकं माझ्याकडे आहेत. विजय तेंडुलकरांचं 'शांतता कोर्ट चालू आहे' हे नाटक मी केलं. त्याच्यात 'बाळू' नावाची भूमिका मी केली होती. त्या वेळेस मला कळलं की ट्रोलिंग हे किती वर्षांआधी सुरू झालंय. एक उच्चभ्रू, सुशिक्षित समाजाने केलेले एका बाईचं ट्रोलिंग आहे. हे कालबाह्य झालेलंच नाहीये नाटक. जयवंत दळवींसारखा नातेसंबंधांवर भाष्य करणारा एवढा मोठा लेखकच मी नाही बघितला. तेंडुलकरांचं ‘पहिलं पान’ वाचा तुम्ही. प्रत्येक वाचकाला अख्खा सेट डोळ्यासमोर उभा राहतो. म्हणजे फटीतून एका कवडसा येत असतो, हेसुद्धा त्यांनी लिहून ठेवलेलंय. हे कोण लिहितं सध्या? हा त्या काळी आमचा अभ्यासच होता. माझे गुरू विश्वास सोहोनी यांनी खूप आम्हाला शिव्या घातल्या. आमच्या चांगल्यासाठीच! पण त्यामुळे आम्ही रंगभूमीकडे खूप गांभीर्याने बघायला लागलो. कॉमेडी इज अ सीरियस बिझनेस! एव्हढं सोप्पं नाहीय. त्याकडे गांभीर्याने बघा. रंगभूमी खूप गांभीर्याने करायची गोष्ट आहे. हे लेखक आमच्या आयुष्यात आले आणि त्यामुळेच आमचं वाचन सुरू झालं. त्याला पर्याय नाही. मी साहित्य संमेलनात गेलो आहे. सर्वांत जास्त झुंबड पुस्तकांकडेच असते. करोनाकाळात तर आम्ही मोबाइलवर स्क्रिप्ट पाठवायचो. मजाच यायची नाही. जोपर्यंत हाताला कागद लागत नाही ना, तोपर्यंत स्क्रिप्ट नाही नीट होत मग! पुस्तकाची सवय लागलीय हाताला, ती कधीही जाणार नाही आता. वाचनाची ओढ आहे ती पुढच्या पिढीपर्यंत दिली गेली पाहिजे. माझा मुलगा कुठे मॉलमध्ये गेला, की आधी क्रॉसवर्ड शोधतो. ती ओढ मी माझ्या मुलाला दिलीय. हा वारसा पुढे नेणं हे प्रत्येकाने केलं पाहिजे. मला आशा आहे, की माझा मुलगाही हा वारसा पुढे नेईल.
शेवटी सगळ्यांत खरं तर कौतुक आणि आणि आभार मानायचेत ते सोनी मराठी आणि संपूर्ण टीमचे. ‘सोनी मराठी’चे जे आमचे हेड आहेत अजय भाळवणकर किंवा अमित फाळके हे किंवा गणेश सागडे ही अख्खी टीम पीआर टीम ओंकार लीड करतो किंवा नॉन फिक्शन-फिक्शन टीम या सगळ्यांचे मला आभार मानायचे आहेत, कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नसतं झालं. विश्वास टाकणं ही फार मोठी गोष्ट आहे. विनोदाच्या बाबतीत खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही त्यात जेवढा कमी इंटरफिअरन्स ठेवाल तितका विनोद खुलतो. विनोद कधीही काट्यांमध्ये खुलत नाही. तो त्याचा त्याचा खुलतो. आज ती पाकळी खुलेल, उद्या ती पाकळी खुलेल. तीच गंमत असते, जी अनप्रेडिक्टीबिलिटी आहे त्याला कुठेही इजा नाही होऊ दिलेली. ‘सोनी मराठी’सारख्या नवीन चॅनेलवर हा कार्यक्रम सुरू झाला ही गोष्टपण आमच्या खूप पथ्यावर पडली. त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार!


-------------------------------------------


अक्षरधारा दिवाळी अंक २३ लेख - भाग १

‘‘हास्यजत्रे’नं आम्हाला जगवलं…’


महाराष्ट्राला आणि मराठी भाषेला विनोदाची मोठी परंपरा आहे. मौखिक साहित्य, लोकसंस्कृती, लोककला, मुद्रित साहित्य, चित्रपट, नाटक यांतून विनोदनिर्मितीचे काम अव्याहत सुरू आहे. तमाशा असो, गण-गवळण असो, वग असो, भारूड असो की कथा-कीर्तन असो; विनोदाचे अस्तर सर्वत्र दिसते. थोडक्यात, महाराष्ट्राला विनोद नवीन नाही. लेखकांमध्येही चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे यांच्यापासून ते द. मा. मिरासदार, शंकर पाटील यांच्यापर्यंत विनोदाची मोठी परंपरा दिसते. कलाकारांमध्येही दामूअण्णा मालवणकरांपासून ते दादा कोंडके ते अशोक सराफ अशी मोठी ‘रेंज’ दिसते. विसावे शतक ओलांडताना महाराष्ट्रात मराठी वाहिन्या सुरू झाल्या आणि तिथेही सुरुवातीपासूनच विनोदी कार्यक्रमांचे पेव फुटले. मात्र, फारच थोडे कार्यक्रम रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवू शकले. ‘सोनी मराठी’ वाहिनीवर सुरुवातीपासून सुरू असलेला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम अशा मोजक्या कार्यक्रमांपैकी एक. सध्या महाराष्ट्रात हा कार्यक्रम आणि यातील सर्व कलाकार सर्वांना मनमुराद हसवण्याचं काम मोठ्या निष्ठेनं करत आहेत. अश्लीलता किंवा कमरेखालच्या विनोदाचा आसरा न घेता, केवळ प्रसंगनिष्ठ आणि जोडीला शाब्दिक, कायिक विनोदाच्या साह्याने हा कार्यक्रम रंगत जातो. त्यामुळेच तो अतिशय लोकप्रिय आहे. ‘अक्षरधारा’च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने ‘हास्यजत्रा’चा हा सर्व प्रवास सर्वांगाने जाणून घ्यावा आणि हा विनोदनिर्मितीचा प्रवास कसा होतो, हे आपल्या वाचकांपर्यंत पोचवावं म्हणून या अंकात ‘हास्यजत्रा’चे कर्ते-करविते दिग्दर्शक सचिन गोस्वामी व लेखक सचिन मोटे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सोबत ‘सोनी मराठी’ वाहिनीचे प्रमुख अजय भाळवणकर व सीनियर क्रिएटिव्ह डायरेक्टर अमित फाळके यांच्याशीही गप्पा मारल्या. आणि अर्थात, यातील प्रमुख कलाकार समीर चौघुले यांच्याशीही आम्ही संवाद साधला, यासाठी ‘अक्षरधारा’चे रमेश राठिवडेकर, रसिका राठिवडेकर, शिवानी राठिवडेकर, ‘अक्षरधारा’च्या कार्यकारी संपादक स्नेहा अवसरीकर यांच्यासह ‘सोनी मराठी’च्या मीरा रोड (मुंबई) येथील स्टुडिओत पोचलो. तिथं ‘हास्यजत्रा’च्या पुढील भागांचं चित्रीकरण सुरू झालं होतं. ‘सोनी मराठी’च्या जनसंपर्क विभागाच्या सहकाऱ्यांनी आमचं आगत-स्वागत केलं. शूटिंगमधून वेळ मिळेल तसतसं एकेक कलाकार येऊन मुलाखत देऊन जात होता. या सगळ्यांशी बोलताना ‘हास्यजत्रा’ची निर्मिती कथा उलगडत गेली. नंतर आम्ही प्रत्यक्ष चित्रीकरणाचाही अनुभव घेतला. हे सर्वच कसलेले कलाकार असल्यानं अतिशय व्यावसायिक सफाईनं, पण उत्स्फूर्तपणे काम करत होते. आम्ही गेलो, तेव्हा परीक्षक म्हणून सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ जाधव होते. प्रसाद ओक यांची भेट काही होऊ शकली नाही. या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका प्राजक्ता माळी मात्र भेटली. या सर्वांशी साधलेल्या संवादातून ‘हास्यजत्रे’च्या निर्मितीचं काही-एक सूत्र शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला. निर्माते, लेखक, दिग्दर्शक, कलाकार, पडद्यामागचे तंत्रज्ञ हे सर्वच अतिशय मेहनतीने हा खेळ उभा करतात, हे नक्कीच जाणवलं.

----


‘कॉमेडी इज ए सीरियस बिझनेस’

(सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांची मी घेतलेली प्रकट मुलाखत...)

नमस्कार,

अक्षरधाराच्या दिवाळी अंक उपक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा सोनी मराठीवरील कार्यक्रम गेली पाच वर्षे सुरू आहे. अतोनात लोकप्रिय आहे. महाराष्ट्रभर लोकप्रिय आहे. जिथे जिथे मराठी मंडळी आहेत तिथे सर्व ठिकाणी हा कार्यक्रम बघितला जातो. हास्यजत्रा हे काय प्रकरण आहे? हास्यजत्रा या कार्यक्रमाची निर्मिती कशी झाली? त्यामागे काय काय परिश्रम आहेत? त्यांच्या कल्पना काय आहेत? हा कार्यक्रम एवढा लोकप्रिय का आहे? या कार्यक्रमाची निर्मिती कशी होते? त्यामागच्या पडद्याआडच्या काही घडामोडी या सगळ्यांची एक बित्तंबातमी आपल्या वाचकांना द्यावी, असं आम्ही ठरवलं. त्यासाठी ‘हास्यजत्रा’चे सर्वेसर्वा म्हणता येतील असे लेखक, दिग्दर्शक व निर्माते सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांच्याशी आम्ही संवाद साधला.

श्रीपाद ब्रह्मे : नमस्कार दोन्ही सचिन सर. मी आधी सचिन मोटे यांना विचारतो की, मुळात ‘सोनी मराठी’कडे तुम्ही कसे आलात? संकल्पनेच्या पातळीवर हा प्रवास कसा सुरू झाला?

सचिन मोटे : ‘सोनी मराठी’वर हा कार्यक्रम करण्याआधी आम्ही दोघांनीही गेली २०-२५ वर्षं विनोद या प्रांतामध्ये बऱ्याच ॲक्टिव्हिटीज एकत्र केलेल्या आहेत. म्हणजे काही नाटकं केली आहेत. काही चित्रपट केले आहेत आणि काही मालिका एकत्र केल्या आहेत. आमच्या दोघांची ‘वेटक्लाउड प्रॉडक्शन्स' नावाची निर्मिती संस्था आहे‌. सोनी मराठीने ‌‘वेटक्लाउड प्रॉडक्शन'ला सांगितलं, की आपल्याला एक मालिका हवी आहे. आम्ही दोघांनीही याआधी असे काही विनोदी कार्यक्रम केले होते. अमित फाळके आणि अजय भाळवलकर यांची एक कल्पना होती, की आपण एकत्र मिळून एक कॉमेडी शो करू या. मराठी वाहिनीवर कॉमेडीला एक मोठं स्थान असतं. या नव्या वाहिनीची ओळख व्हावी, असा कार्यक्रम असावा, अशी मूळ कल्पना होती. आम्ही मग सुरुवातीला भेटलो आणि भेटल्यावर त्या चर्चेतूनच मग आम्ही हास्यजत्रा हे नाव ठरवलं. मग भाळवलकर सरच म्हणाले, की आपण त्याला ‌‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' असं नाव देऊ या. कारण ती एक मोठी ‌‘अम्ब्रेला' असेल. ‌‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’तून आपण संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहोत. सगळ्या महाराष्ट्रातून विनोद, तिथल्या प्रातिनिधिक भाषा या सगळ्यांना एकत्र आणून आपण काही तरी करू या, अशा विचारातून त्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. मग या कार्यक्रमाची एकूण मांडणी तयार झाली. सुरुवातीला आम्ही एक स्पर्धा स्वरूपात हा कार्यक्रम केला होता. त्या स्पर्धांच्या सीझनमधूनच आम्हाला कलाकारांचा आजचा जो संच आहे तो हळूहळू गवसत गेला. काही कलाकार आधीपासूनच आमच्या बरोबर होते. काही कलाकार स्पर्धेतून आले. काही कलाकार आधी होते, पण त्या स्पर्धेतून त्यांच्यातील टॅलेंट जास्त जाणवलं आणि त्यातून आजचा हा संच तयार होत गेला. 

श्रीपाद ब्रह्मे : सचिन गोस्वामींना पुढचा प्रश्न विचारतो. हा संच तयार झाल्यानंतर दिग्दर्शक म्हणून तुमच्याकडे सगळी मोट बांधायची हे काम आलं असेल. तर त्या पातळीवर तुम्ही काय विचार केला? कारण त्या वेळी महाराष्ट्रात इतर वाहिन्या होत्या. त्या वाहिन्यांवर लोकप्रिय असे विनोदी कार्यक्रम सुरू होते. मग ‘सोनी मराठी’वरील आपला कार्यक्रम वेगळा कसा ठरेल, लोकांनी तो का बघावा यासाठी तुम्ही नक्कीच काही विचार केला असेल. तो काय प्रवास होता? त्या संकल्पनेच्या पातळीतून तुम्ही पुढे कसा नेला तो कार्यक्रम?

सचिन गोस्वामी : एखादा कार्यक्रम जेव्हा यशस्वी होतो तेव्हा तो सामूहिक प्रयत्नातून यशस्वी होतो. कुणा एकट्याच्या विचारावर कधी कार्यक्रम चालत नाही. अशा पद्धतीचे अनेक सामूहिक प्रयोग केल्यानंतर मात्र एक अंदाज यायला लागतो. म्हणजे प्रेक्षक कळणं ही एक भ्रामक कल्पना आहे. पण साधारणत: अंदाज येतो, की या या टप्प्यावर असं असं केलं तर साधारणत: अशी प्रतिक्रिया असते. तर तो अनुभव आमच्या दोघांच्या गाठीशी होता. इतर वाहिन्यांवरील अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही केले होते. त्यात काही चुका केलेल्या होत्या. काही बरे झाले होते. त्या प्रतिक्रियांतून तो अंदाज येत होता. हा कार्यक्रम सुरू होण्याच्या एक वर्ष आधी आमच्याच प्रॉडक्शन हाउसचा अशाच प्रकारचा एक विनोदी कार्यक्रम दुसऱ्या वाहिनीवर सुरू होता आणि तोही खूप लोकप्रिय झाला होता. त्याचे जवळ जवळ ४१३ एपिसोड झाले होते. तोसुद्धा त्या वाहिनीचा मुख्य कार्यक्रम म्हणून पाहिला जात होता. तशा प्रकारचाच एक शो आपण इथे परत करायचा म्हटल्यावर, तुम्हाला तुम्हीच केलेला आराखडा पुन्हा पुसून नवीन आराखडा आखायचा असतो. त्याचे स्वरूप तेच असतं. विनोदीच करायचा आहे; या या अभिनेत्यांना घेऊन त्या मर्यादेतच करायचा आहे; पण मागचे आराखडे पुसले आणि यातले हे कोन वापरायचे नाहीत असं ठरलं तर नवीन आकार आपल्याला आखता येतो. तसं काहीसं इथे झालं. मागच्या कार्यक्रमात आम्ही जे ‌‘स्किट्स' करायचो त्या स्किट्सना संख्येची मर्यादा होती. म्हणजे त्या वेळी तीन जणांनी ते करायचं. आता चार जणांत करतो. त्यातले बरेचसे स्किट्स घडून गेलेल्या गोष्टींवर भाष्य करणारे होते, कॉमेंट बेस्ड होते. वर्षभरानंतर त्याच्यावर पुन्हा पुन्हा विचार केल्यानंतर आमच्या लक्षात आलं, की जसा काळ बदलतो तसे विनोदाचे प्रमाण बदलतं, पद्धत बदलते. ज्या वेळी आपण या चॅनेलसाठी पुन्हा काम करतो आहोत, त्या वेळी विनोदाचे सोर्सेस पण खूप वाढले आहेत. इंटरनेट आलं म्हणजे आज प्रत्येकाच्या मोबाइलवर आता विनोद येतो. ‘शुभ सकाळ’ आणि ‘विनोद’ अशी परंपराच आहे आपल्याकडे! त्यामुळे रोज इतका विनोद इतक्या सोर्सेसमधून तुमच्यापर्यंत येतो तर त्या विनोदाच्या पलीकडे एक विनोद साधायचा तर काय करता येईल? त्या वेळी आमच्या असं लक्षात आलं की आपण भूतकाळावर खूप कमेंट करणारे स्किट्स जास्त केले आहेत, तर आता ते टाळायचं. या प्रकारामध्ये आम्ही ठरवलं, की जे आपण करू ते तिथे घडणारं असेल! असं ठरवल्यावर मग घटना जास्त महत्त्वाच्या झाल्या. सिच्युएशनल कॉमेडीच्या अंगानं आमचा विचार सुरू झाला. आता साडेसातशे भाग झाले आहेत. त्यातले ९० टक्के भाग आणि स्किट्स असे आहेत, की ते त्या ठिकाणी घडणाऱ्या घटना आहेत. मुळात एखाद्या कार्यक्रमाचं आरेखन करणे म्हणजे त्याची फक्त दिशा ठरवावी लागते. मग दर आठवड्याला तो कार्यक्रम तुम्हाला सांगत जातो की तू आतापर्यंत हे केलंस ना, आता हे केलं पाहिजे. हे हे नीट नाही झालं. हे चांगलं झालं. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया, नटांनी सादर केलेले स्किट्स, लेखकांनी, सगळ्यांनी मिळून तयार केलेले स्किट्स ते कागदावर कसे होते, ते रंगमंचावर आल्यावर कसे झाले, त्याच्यावरच्या संकलनाच्या सगळ्या संस्कारांनंतर ते कसे झाले आणि ते टीव्हीवर नऊ वाजता ज्या वेळी आपण घरी पाहतो तेव्हा तिथल्या सगळ्या वातावरणातल्या ध्वनींमध्ये कसं पोहोचतं, याचा एकदा अंदाज आला, की मग तुम्हाला कळतं, की तुम्ही तिथे तुमचं शंभर टक्के योगदान दिलं होतं ते नऊ वाजता फोडणीच्या आवाजात, घरातल्या भांड्यांच्या आवाजात, माणसांच्या ये-जा करण्यात, दारावरची वाजणारी बेल या सगळ्या आवाजांत ते फक्त साठ टक्केच पोहोचतं. मग त्याचा व्हॉल्यूम काय असला पाहिजे, बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, त्याच्यावर आम्ही सतत आमच्या टीमबरोबर चर्चा करीत असतो. कदाचित याचं यश काय आहे, तर आम्ही सगळे नेहमी एका मार्गावर राहण्याचा प्रयत्न करतो. दर वेळेला स्किट संपलं, की सगळी टीम मिळून आम्ही पाच मिनिटे बोलतो. तो काही ब्लेम गेम नसतो. तेथे आम्ही ‌‘हे आज फसलंय, हे थोडं लेन्दी झालंय किंवा आज छान झालंय,’ असं कौतुकसुद्धा शेअर करतात हे लोक. ‘हे अचानक केलेलं मस्त झालंय, ते पूर्वनियोजित केलेलं चांगलं नाही झालं,’ असं प्रत्येक स्किटचं मंथन प्रत्येक वेळी घडत जातं. तसं एकूण प्रयोगाचंसुद्धा आम्ही दर वर्षाला एकदा बसून ठरवतो की हे हे आपण केलंय, हे हे नाही करायचं, हे करायचं. याचं दिग्दर्शन, आरेखन असं आहे, की तुम्हाला सतत वास्तवात राहायचंय आणि प्रत्येक वेळी घडलेल्या गोष्टींचं मूल्यांकन करून पुन्हा पुढे जायचंय. अशी साधारणत: ती आखणी असते. 

सचिन मोटे : सचिन जे म्हणाला ना, त्याचं उदाहरण सांगतो. बोलताना आम्ही पटकन बोलतो की आता घडतंय आणि ॲक्च्युअली एखादा परफॉर्मन्स घडत असतो त्या वेळी तो दोन काळांत असतो. इथे वर्तमानकाळात तिथे चाललेलं असतं. वर्तमानकाळातील ती पात्रं आपल्याला दिसत असतात. आधी काय व्हायचं, तिथे वर्तमानकाळ सुरू असायचा आणि ते दोघे जण भूतकाळाबद्दल बोलत असायचे. तुम्ही आबूराव-बाबूराव घ्या, तुम्ही गण-गवळण बघा किंवा जुने आपले शो - स्टँडअप आठवा. तिथे दोघे येतात आणि मग एक लग्नकार्याला आलेला म्हातारा असतो. त्याला लग्न कार्यालयाचा आयोजक तो वेगवगेळ्या कंडिशन्स सांगत जातो आणि त्यातून एक विनोद तयार होतो. आमच्या इथं परवा असं झालं होतं. मागच्या वेळी त्या नवरदेवाने अक्षता फेकल्या, त्याबरोबर नवऱ्या मुलीच्या का कुणाच्या तरी डोळ्यांत गेल्या; भटजींना त्याचा त्रास झाला वगैरे असं सगळं ते फक्त लिहिलेलं असायचं. आता आम्ही तो समारंभ ॲक्च्युअली करतो. आता खरंच समीर चौघुले रांगेत उभा आहे आणि विशाखा सुभेदारनं साकारलेली एक म्हातारी येऊन त्याच्यातलं खातेय असं सगळं! याचा जास्त आनंद सगळ्यांना मिळायला लागला. आता विनोदी फटकारे, ताशेरे आणि विनोद तिथे घडायला लागला. त्यामुळं त्याचं एक वेगळेपण जाणवायला लागलं. 

सचिन गोस्वामी : आम्ही जे टप्प्याटप्प्यानं करत आलो होतो तेव्हा आम्हाला जाणवलं की चुटकुले सांगणे ते नाटुकलं घडवणे यापर्यंत आम्ही आलो. बारा मिनिटांत ते पंधरा मिनिटांत चुटकुले सांगत सांगत लोकांना हसवणं इथून सुरू झालेला, स्टँडअप कॉमेडीपासून सुरू झालेला हा फॉर्म आता पंधरा मिनिटांची तीन नाटुकली म्हणजे एक भाग असं झालं. टी-२० सारखं समजा! 

सचिन मोटे : याची निकड हळूहळू करताना जाणवत जाते. आधीच्या पेक्षा आपल्याला थोडं तरी पुढे जायचं असतं. त्यातून आम्ही इथपर्यंत आलो. 

सचिन गोस्वामी : याचेही तुम्ही सुरुवातीपासूनचे भाग बघाल तर ते दोन किंवा तीन पात्रांचेच आहेत. पण हळूहळू विषयाला मर्यादा यायला लागते. प्रिमाइस तोच असतो. अशा वेळी तुम्हाला स्वरूप बदलायला लागतं. मग ज्या वेळी कॅरेक्टर वाढतील त्या वेळी वेगवेगळी लोकेशन्स घ्यायला लागतात. गणपती दर्शनासाठी आलेली रांग हा तीन जणांमध्ये टाळला गेलेला विषय असतो. किंवा एखादा जोडीसाठी केलेला विषय विचारात घेतला जात नाही. पण नवरा-बायकोची गणपती दर्शनाला जाण्याची चर्चा, या सर्वांचे निमित्त या सगळ्या चौकटीत तो विषय राहतो. ज्या वेळी आपण एखाद्या समूहाला दूर करायचं ठरवतो तेव्हा तेच नवराबायको गणपती दर्शनाच्या रांगेत आहेत हा एक नवा परिसर मिळतो. आता दोन-तीन कॅरेक्टरची स्किट्स आता आठ, दहा, बारा अशा पात्रांमध्ये यायला लागली आहेत. मग हळूहळू सूचक नेपथ्याला जास्तीत जास्त रिॲलिस्टिक करण्याचा प्रयत्न केला जातो. शेवटी ते त्या मर्यादेतच असतं, भासमानच असतं. पण तो भास तयार होईल आणि ते खरं वाटेल इतपत ते कॅरेक्टर आम्ही रचायला लागलो. 

श्रीपाद ब्रह्मे : लेखक म्हणून आता जेव्हा एक अशी चौकट ठरली की आता आपल्याला सिच्युएशनल कॉमेडीकडे जास्तीत जास्त जायचं आहे. नंतर नंतर तो प्रवास दोन कॅरेक्टरकडून अधिक कॅरेक्टरकडे जाऊ लागला. तर मग हे सर्व लेखक मंडळींना हे कितपत आव्हानात्मक होतं? कारण तुम्हाला पूर्वी एका पद्धतीने लिहायची सवय असेल किंवा तशा पद्धतीचे विनोद सहज निर्माण केले जात असतील. पण आता मात्र तुम्हाला एका वेगळ्या प्रतलावर खेळायचंय. तर लेखक म्हणून तुम्ही हे कसं जमवलं?

सचिन मोटे : लेखक म्हणून काम करताना तसं एक टीम आमच्या सोबत होतीच. मी आणि सचिन स्वत: दोघंही एकत्र कॉन्सेप्ट डेव्हलप करीत असू. यात आम्हाला समीर चौघुले सोबत होता. तो स्वत: परफॉर्मर पण आहे आणि लेखक पण आहे. प्रसाद खांडेकरही परफॉर्म करतो आणि लेखक पण आहे. त्यानंतर आम्हाला पहिल्या दोन सीझनमध्येच श्रमेश-प्रथमेश अशी एक रत्नागिरीची मस्त जोडी मिळाली. ते स्वत: उत्तम लेखक आहेत आणि अभिनय करणारे आहेत. आता लेखक आणि अभिनय हे दोन करणाऱ्यांना स्वत:चा परफॉर्मन्स बघत बघत लेखन करण्याची सवय असते. परफॉर्मन्स ओरिएंटेड रायटिंग त्यांच्याकडून आपोआप होत असते. समीर त्याची कॅरेक्टर लिहिताना मी कसं करेन असे करून त्याला एक लिहिण्याची सवय असते. असे लेखक होते. त्याचबरोबर आमच्या फळीमध्ये असे काही लेखक आले, की त्यामध्ये विनायक पुरुषोत्तम म्हणून आमच्या शोचा लेखक आहे तो आमच्या इथे सहायक दिग्दर्शक म्हणून होता. ज्याने सचिनला साहाय्य केलं होतं. त्याला लेखक व्हायचं काही डोक्यात नव्हतं. त्याला हळूहळू धरून लेखक म्हणून आणला. त्याला जरा सुचतं. पहिल्या स्किटपासूनच आमच्या दोघांच्या लक्षात यायला लागलं की हा मध्ये मध्ये छोटे काही तरी विनोद पुरवत/सुचवत असतो. शाब्दिक विनोद त्याला सुचतात. मग तो आला. अमोल पाटील आमच्याबरोबर काम करतो. त्यालाही नर्मविनोद लिहिण्याची चांगली शैली आहे. त्याच्यानंतर हृषिकांत राऊत म्हणून एक लेखक आहे. अभिजित पवार हा एक उत्तम अभिनेता असलेला लेखक आम्हाला जॉइन झाला. महाराष्ट्रात विनोदी लेखनाची एक मोठी परंपरा आहे. तिचा नाही म्हटलं तरी सगळ्यांमध्ये खूप परिणाम असतोच. सचिनने पण मराठी विनोद पूर्वीपासून वाचलेला आहे, बघितलेला आहे. आपण सगळेच जण अगदी शंकर पाटील, द. मा. मिरासदार वाचत; (वसंत) सबनीसांची नाटकं, वेगवेगळी विनोदी नाटकं बघत बघत आपण मोठे झालो. या सगळ्या लेखकांमध्ये तो विनोद होताच. त्यातून आजच्या काही स्टँडअप विनोदवीरांकडे एक जो काही थोडा अपमानाकडे जाणारा विनोद आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. कपिल शर्मा शो अशा कार्यक्रमांतून आलेले ते फ्लेवर्स आहेत. तसा तो आपल्या मातीतलाही विनोद आहे. तर वेगवेगळे लोक इथे विनोदाचा फ्लेवर घेऊन एकत्र आले. त्या सगळ्यांत आम्ही दोघं पहिल्यापासूनच सिच्युएशनल कॉमेडी करणारे. म्हणजे आमची सगळी नाटकं तुम्ही बघितली तर ती प्रसंगनिष्ठ आहेत. त्यामुळे आम्ही सिच्युएशन कॉमेडी करणारे आणि त्याच्यातले हे छोटी छोटी वैशिष्ट्यं असलेली लोक हे सगळे एकत्र आल्यामुळे एक वेगवेगळ्या पद्धतीचा विनोदाचा एक छान गुच्छ तयार झाला. जसा तुम्हाला इथे नटांचा एक चांगला गुच्छ दिसतो ना, तसा तो तिकडे लेखकांचा आहे. अर्थात त्यांच्यातील प्रत्येकाचं छोटं छोटं वैशिष्ट्य आहे. कुणी अजून खुलतंय. कुणी पूर्ण एका पद्धतीचे खुललेलं आहे. आम्ही वेगळ्या, नव्या लेखनाच्या कायम शोधातही असतो. या विविध पद्धतीच्या लेखकांमुळे हे झालं. सगळ्या गोष्टी तयार झाल्या आणि आम्ही वेगवेगळ्या गोष्टी रचत गेलो. त्याच्यात आम्हाला वेगवेगळी कॅरेक्टर्स सापडत गेली. सचिन स्वत: कॅरेक्टर्स खूप छान डेव्हलप करतो. म्हणजे आमचं होतं असं, की आम्ही एक प्रसंग करतो. जो लिहिलेला असतो तो प्रसंग इथे डेव्हलप होतो. तो प्रसंग करताना कलाकारांना काही छान लकबी देतो आणि ते तसं परफॉर्म करतात. त्यातून कदाचित आम्हाला मग लेखक आणि प्लस याने परफॉर्म केलेल्या गोष्टी याच्यातून आम्हाला सीरीज मिळत जातात. उदा. ‘लॉली’चं कॅरेक्टर. नम्रता संभेरावचा परफॉर्मन्स, लेखक आणि शिवाय दिग्दर्शन करताना ज्या गोष्टी घडल्या, त्यातून आम्हाला आणखी पुढच्या शक्यता दिसत गेल्या. समीर चौघुलेंची बरीचशी कॅरेक्टर्स असतील. ‘लोचन मजनू’पासून ते अनेक कॅरेक्टर्स बघत असाल. प्रसाद खांडेकरांची स्लो-मॅनपासून अनेक कॅरेक्टर्स बघितली असतील किंवा पृथ्वीक प्रताप वेगवेगळी कॅरेक्टर्स करतोय. सगळे जण आम्ही थोडे गोष्ट सांगणारे असल्यामुळे एक गोष्ट सापडली, की त्या गोष्टीला दुसरा डबा आता कसा जोडता येईल, तिसरा कसा जोडता येईल, त्यातून या सातशे भागांची अख्खी रेल्वे तयार झाली. नाही तर ते तिथेच संपून गेलं असतं. आजही असं होतं, की एखादी गोष्ट करून झाली की वाटतं, याची सीरीज होऊ शकेल. ती गोष्ट पहिल्यांदा करताना आम्हाला माहिती नसते की याची सीरीज होणार आहे म्हणून. ‘लोचन मजनू’ ही तर अगदी अलीकडच्या काही काळात सापडलेली सीरीज आहे. सचिन म्हणाला, की आपण समीर चौघुलेला सतत त्रास देतोय. समीर चौघुले इतरांना त्रास देईल असं काही तरी करू या. त्याच्यातून काय करता येईल? मग निवेदक आणू या. मग तो पहिलाच सहज म्हणून पाचशेवा प्रयोग आम्ही केला. मी म्हटलं की अरे, हा पाचशेवा प्रयोग होऊच द्यायला नको आपण! याचा पाचशेवा प्रयोग होतच नाहीये असं त्यांना आपण प्रत्येक वेळी करत जाऊ या आणि मग त्याच्यातील एक एक गोष्टी मिळत जातात. अशीच आम्हाला शंकऱ्याची एक लव्ह स्टोरी मिळाली आहे. ती तर एक गावातील लव्ह स्टोरी. पूर्वी ‌‘गोष्टी गावाकडच्या' नावाची एक मालिका असायची. त्या मालिकेचा एक, दोन, तीन भाग चालायचा आणि आपल्याला कळायचं किंवा नुक्कडमध्ये दर आठवड्याला काय व्हायचं त्या दोघांमध्ये, तेच इथेही होतंय. फक्त आता दहा-दहा, बारा-बारा मिनिटांच्या सीरीजमध्ये कुठे कुठे विनोद चालू आहे, कुठे कॅरेक्टर्सचा विनोद चालू आहे, कुठे कुठे सिच्युएशनल कॉमेडी असे वेगवेगळे प्रकार एकत्र जोडत जोडत तयार झालेले आहेत.

सचिन गोस्वामी : आपण जे म्हणालात ना, की हे तुम्हाला कुठं असं जाणवायला लागलं की अमुक अमुक. तर ते तसं नाहीये. जसं उत्क्रांतीत आपण शेपूट कुठं जोडलीय हे कुणाला माहीत नाही, तसंच हे आहे. या प्रवासात नेमका भाग बदलला, पण कुठे बदलला याचा स्पष्ट टप्पा नाही. म्हणजे तो दिवस नाही तुम्ही सांगू शकत, तो क्षण नाही सांगू शकत; पण ते जाणवायला लागतं. जर तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचं मूल्यांकन करत गेला किंवा त्याच्यावर चिंतन करत गेलात तर आपल्याला जाणवतं की हे आता चेंज झालंय. हे नाही वापरायचं. याचा पर्याय काय? ‘लोचन मजनू’ची अजून एक गंमत सांगतो. कधी कधी परिस्थिती तुम्हाला काही गोष्टी क्रिएट करायला लावते. अगदी स्पष्टपणे सांगायचं तर विशाखा ज्या वेळी शोमधून जेव्हा बाहेर गेली, त्यानंतर त्यांचा एक फॉरमॅट होता ‘जाऊ या गप्पांच्या गावा’; त्या फॉरमॅटचं काही तरी समांतर एक स्वरूप यायला हवं होतं. काय होतं की एखादा फॉरमॅट, एखादी कलाकृती त्या त्या नटांच्या इतक्या ‘बॉडी’ने आणि त्या ‘सोल’ने फुललेली असते तिथे रिप्लेसमेंट शक्य नसते. विशाखाची रिप्लेसमेंट आम्हाला शक्य नाही. तिने ती अजरामर केलेली कॅरेक्टर आहेत किंवा समीरचीही रिप्लेसमेंट शक्य नाही. आमच्यापैकी कुणाचीच रिप्लेसमेंट शक्य नाही. अशा वेळी तुम्ही वेगळ्या पद्धतीने लोकांची ती भूक भागवू शकता. आमच्या ६० टक्के स्किटमध्ये समीरला कुणी तरी त्रास देतंय, असा एकच फॉरमॅट होता. त्या वेळी ही कल्पना मग जास्त अधोरेखित झाली. असा एक निवेदक आपण आणायचा पण वेगळ्या फॉरमॅटमध्ये. तो आता सेट झालाय. त्याचं अस्तित्व त्यानं तयार केलंय. चुकूनही तुम्हाला ‘जाऊ या गप्पांच्या गावा’ची रिप्लेसमेंट वाटणार नाही इतकं स्वतंत्रपणे. त्याच्या गरजेप्रमाणे पण असतं कधी कधी. एखादी सीरीज काही अडचणींमुळे जर थांबली असेल तर त्या सीरीजची भूक आपण दुसऱ्या माध्यमातून भागवू शकतो का? ती एक गरज असते व त्याचा तो परिणाम असतो.

श्रीपाद ब्रह्मे : ‘हास्यजत्रा’तील अनेक कलाकारांशी आम्ही बोललो. तुमच्या दोघांच्याबद्दल सगळे खूपच भरभरून बोलत होते. तुम्ही त्यांना कसं घडवलं किंवा तुमच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतो, असं ते सांगत होते. तुम्ही जेव्हा दिग्दर्शन करता त्या वेळी या सर्व कलाकारांचं कॅरेक्टर डेव्हलप करणं किंवा त्याच्यामध्ये एखादी लकब देणं असो; या सर्वांचं श्रेय  दिग्दर्शक म्हणून तुमच्या एकट्याचंच असतं की सामूहिक विचार-विनिमयातून येतं?

सचिन गोस्वामी : नाही नाही. शेवटी एकत्रच सगळ्या गोष्टी होतात. कसं होतं ना की कुठल्या गावाला जायचं हे एकदा ठरवलेलं असलं, की ड्रायव्हर-कंडक्टरच्या हातात बसचा प्रवास असतो. मग त्याने कुठल्या मॉलला किती वेळ थांबायचं हे तो ठरवतो. गाडीचा वेग काय असला पाहिजे, हे तो ठरवतो. मध्ये कुणाला जर स्टेशन नसतानाही उतरायचे असेल तर उतरू द्यायचे का नाही हेही तो ठरवतो. तसं आम्ही ड्रायव्हर-कंडक्टर आहोत. 

सचिन मोटे : सचिनचे कसे आहे, की तो दिग्दर्शन करताना त्या कलाकाराचेच ॲसेट वापरून त्याला कॅरेक्टर देतो. म्हणजे ओंकार भोजने काय करू शकेल तर त्याला तसं पॅकेज देतो. त्यामुळे ओंकार भोजनेचं काय होतं त्याला जे दिलं गेलेलं असेल त्याला ते सूट होतं. म्हणून मग तो त्याच्यात अजून स्वतःच्या चार गोष्टी पण घालू शकतो. त्याला मॅच न होणारं जर काही त्याला आलं ना, तर कदाचित त्याची धांदल उडेल. पद्धतच आमची बऱ्याचदा अशी असते, की त्याच्या त्याच्या शक्यता बघूनच त्यांना काम दिलं जातं. म्हणून मग तेसुद्धा त्याच्यात इम्प्रोवाइज करतात. कधी कधी असं असतं, की याने दिलेली एक गोष्ट असेल मग त्याच्यात कलाकाराला दुसरी, मग त्या दोन्हींत प्रत्यक्ष करताना आणखी दोन नवीन गोष्टी ॲड होतात. मग लेखक लिहिताना स्वतःकडून अजून एक काही तरी टाकतात. 

सचिन गोस्वामी : एक कॅरेक्टर तयार होतं ना, तेव्हाच त्याच्या काही लकबी तयार होतात. तेव्हा त्या लेखकांसाठी एक आउटलाइन तयार होते. पुढच्या वेळी ते पुन्हा ते बघावं लागत नाही. ती पात्रं ती वैशिष्ट्यं घेऊनच लिहिली जातात. मग कलाकाराची ती ‘प्रॉपर्टी’ झाली, की तो ती जीवापाड जपतो. मुळात ही कलाकारांची क्षमता आहे म्हणूनच आपण त्यांना काही तरी सांगू शकतो. ही कोणाकडूनही करून घेण्यासारखी गोष्ट नाही. दिग्दर्शक म्हणून किंवा लेखक म्हणून आम्ही दोघेही या सगळ्या व्यापांच्या बाहेर आहोत म्हणून तटस्थपणे बघू शकतो. नटांचं काय असते की तो ज्या वेळी रंगमंचावर असतो तो जेव्हा त्या संहितेच्या संस्करणासाठी बसतो, तेव्हा तो त्याचं म्हणून एक विश्व असल्यामुळे तो त्या दृष्टीनेच सगळ्या गोष्टींकडे पाहतो. आमचं तिथे काहीच नसल्यामुळे आम्ही तटस्थपणे त्या सगळ्यांकडे पाहतो. त्यामुळे दिग्दर्शक मग तो मी असो की कोणी असो; त्याला त्याचं सगळे चित्र स्पष्ट दिसत असतं. तो जास्त स्वच्छपणे काम करतो. नट स्वतः दिग्दर्शक असेल तर त्याला तेवढं जमत नाही. कारण तो रंगमंचावर असतो आणि तो त्याच्या पंचेसच्या पलीकडे उरलेलं वाटत असतो. त्याच्या वाटण्याला मर्यादा आहेत. आमच्या वाटण्याला काही मर्यादाच नाहीत; कारण आम्हाला हे सगळं तुमच्यात वाटायचं आहे, हे ठरलेलं असतं. त्यामुळे हे जेवढं आमचं क्रेडिट आहे ना तेवढं नटांचंही आहे. नटांमध्ये ती क्षमता आहे, कमी वेळात दिलेल्या गोष्टी करण्याची, म्हणून तर त्याला ते दिलं जातं. नाही तर ते शक्य नाही.

श्रीपाद ब्रह्मे : लेखक म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो, की आत्ताचा काळ आज जो आपण बघतो आहोत तो अतिशय संवेदनशील आहे. समाजात थोडीशी असहिष्णुता पण वाढली आहे. थोड्याशा कारणाने अमुक एक नाराज होतात. तमुकांना असं वाटते की हा आमचा अपमान झालाय. अमुक एका समाजघटकाला वाटते की हे आमच्यावर का लिहिले आहे? थोडक्यात म्हणजे वेगळ्या प्रकारची अप्रत्यक्ष दबाव खूप निर्माण होतो. यापूर्वीही टीव्हीवर सादर झालेल्या कार्यक्रमांना अनेकदा रोषाला सामोरे जावे लागले आहे. ते चांगले का वाईट यामध्ये जायला नको, पण आत्ताची परिस्थिती अशी दिसते. त्यामुळे मग लेखक म्हणून तुमच्यावर खूप मर्यादा येतात असे तुम्हाला वाटते का? काही गोष्टी आता आपण करू शकत नाही म्हणून? हे जे कथित दबाव गट आहेत, कदाचित बेकायदा, पण ते प्रभावी आहेत आणि ते तुमच्यावर दबाव आणतात. त्यांना हाताळताना लेखक म्हणून खूप त्रास होतो किंवा मर्यादा येतात असं वाटतं का? कारण विनोदनिर्मितीत असं म्हटलं जातं की कॉमेडी इज अ सीरियस बिझनेस… पण तो करताना आपल्याला एवढ्या साऱ्या गोष्टींना झुंजायला लागतंय असा काही अनुभव तुम्हाला येतोय का?

सचिन मोटे : हे खरंच आहे. केवळ विनोदच नाही, तर सगळ्याच पद्धतीची कला किंवा जनतेशी संबंधित जे प्लॅटफॉर्म आहेत तिथे सगळीकडेच आज हे भान ठेवूनच काम करायला लागतं, की या गोष्टीमुळे कुणी दुखावू नये. या सगळ्याचा परिणाम विनोदावर झालाच आहे. गेल्या पंचवीस-तीस वर्षांमधला बदलत गेलेला विनोद बघताना हे जाणवतं, की यातल्या बऱ्याचशा गोष्टींवर – पूर्वी जे काही समाजातले जे घटक होते ते – मग तो इतिहास असेल, पुराण असेल किंवा राजकीय व्यक्तिमत्त्वं असतील किंव सरकारी कामकाज असेल - या सगळ्या गोष्टींवर पूर्वीचे कलाकार जितक्या निर्भीडपणे आणि खेळकरपणे व्यक्त होऊ शकायचे तेवढे आता आम्ही व्यक्त नाही होऊ शकत. आम्हाला खेळकरपणे काही व्यक्तींची नावं घेऊन तर सोडाच; पण सूचकसुद्धा व्यक्त होण्याला मर्यादा येऊ लागल्या आहेत. आम्हाला विनोदी कलाकार, लेखक म्हणून निश्चितच सतत जाणवणारा हा त्रास आहे. दुसरीकडे समाजही भित्रा होत चालला आहे आणि खूप दु:ख नको, असा समाज वाढायला लागला आहे. पूर्वी लोकांना विनोदातून दु:ख चालायचं. विनोदाने एक प्रकारची टोचणी दिलीय, बोचरा विनोद असायचा, विनोद तुम्हाला तसं काही सुनावून गेला, की लोक अंतर्मुख होऊन टाळ्या वाजवायचे, दाद द्यायचे.

श्रीपाद ब्रह्मे : तो विनोद चांगला मानला जायचा…

सचिन मोटे : चांगला मानला जायचा आणि तो चांगला असतोच. आजही चांगलाच आहे. मात्र, लोक आजकाल खूप हळवे व्हायला लागले आहेत. कोव्हिड काळात तर असं झालं, की आता याला चांगलं-वाईट नाही म्हणू शकत आपण; पण कोव्हिड काळातली परिस्थिती अशी होती की, माणसं खूप घाबरली होती. त्यांना असं वाटायचं, की तुम्ही आम्हाला काही वैचारिकही सांगू नका आणि त्रास होईल असंही काही सांगू नका. आता आम्हाला आजूबाजूनेच एवढं घाबरवलं जातं, आजूबाजूनेच एवढा त्रास आहे, की आम्हाला दोन घटका काही तरी हसवा. आम्हाला निखळ करमणूक द्या. ‘हास्यजत्रे’कडून ही डिमांड खूप वाढली. ‘हास्यजत्रे’चं नाव आज आपण पाच वर्षे घेतो, त्याच्यातील कोव्हिडची दोन वर्षे खूप मोठी आहेत. या काळात ‘हास्यजत्रे’नं अनेकांना जगवलं असं लोक आम्हाला सांगतात. याला कारणही हेच आहे की आम्ही निर्विष विनोद देण्याचा प्रयत्न केला. आमचा विनोदही असा असायचा, की तो कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना त्रासदायक वाटायचा नाही. कुठल्याच धर्माच्या माणसाला असं वाटायचं नाही, की यातून माझ्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. म्हणजे नकळत आम्हाला या कार्यक्रमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही गोष्ट पोषक ठरली; अन्यथा आम्ही जर एका वर्गाला किंवा एका गोष्टीवर जास्त बोलत राहिलो असतो तर आता जितक्या निखळ पद्धतीने आम्हाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता म्हणतो, की आम्हाला तुमचा कार्यक्रम आवडतो. आम्ही तो आवडीने बघतो, तर तसं तो म्हणू शकला नसता, आता कुठल्याही वर्गातला सामान्य माणूस म्हणतो, मग तो गरीब असो, श्रीमंत असो; गुजराती असो बंगाली असो; अशी सगळी माणसं जे म्हणतात ना, याला कारण कदाचित या सगळ्यापासून आम्ही लांब राहिल्याचा परिणाम असेल; पण तरीसुद्धा हे लांब राहणं आम्हाला खूप त्रासदायक वाटतं. कारण त्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विनोदी कलाकाराला राजकीय भाष्य करता येणं, विनोदी कलाकाराला सामाजिक भाष्य करता येणं, त्याला एखाद्या व्यक्तिरेखेचं, त्यावरचं काही कॉमिक अर्कचित्र रेखाटता येणं आणि एका वेळी कुठल्याही पातळीवरच्या नेत्यांच्या आपण तशी व्यक्तिरेखा रेखाटू शकायचो. त्याचा मोठा फटका आहे तो आम्हीच नाही तर समाजही भोगतोय. आपण सगळेच भोगतोय. आपण फक्त पुढे पुढे जात असतो म्हणून आपल्याला ते कळत नाही. आपण मागच्या कोणत्या चांगल्या गोष्टी गमावत चाललोय. त्यामुळे तुम्ही जे बोललात ते खरंच आहे. 

सचिन गोस्वामी : हे जे तुम्ही म्हणताय तसं व्यापक दृष्टीनं पाहिलं तर तसं नाहीये. म्हणजे हे जे भावना दुखावताहेत म्हणतोय त्या सरसकट सगळ्या समाजाच्या नाही दुखत. समाजाचे जे ‌‘सो कॉल्ड’ प्रतिनिधी म्हणून जे छोटे छोटे गट तयार झाले त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी त्या भावना दुखावल्या जातात हे लक्षात घेतलं पाहिजे. की एखादा विषय जर एखाद्या वर्गाला तो विनोद त्या वर्गावर टीका करणारा आहे असं कुठला एक गट सांगत असेल तर तो गट फक्त त्याच्या अस्तित्वासाठी त्याचा ‘इश्यू’ करतो. त्या वर्गाला त्या विनोदातून फक्त आनंदच मिळतो, असं मी पाहिलंय. आता सोशल नेटवर्किंगमुळे काय झालंय की सगळे ॲक्सेसेबल आहेत. म्हणजे गोस्वामी जर काही बोलला तर गोस्वामीपर्यंत पोचताच येतंय. सामान्य माणसाला या सगळ्याशी काही देणं-घेणं नाही. विनोदाने इतकं पोषण झालंय महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचं किंवा संपूर्ण सामाजाचं, की तो विनोदाला कधीच दूर करीत नाही. विनोद आणि राजकीय भान हा तर त्याच्या जगण्याचा अर्कच आहे. पण काही जे विशिष्ट गट तयार झालेत ते त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी, अस्तित्वासाठी त्याचा इश्यू करतात. कारण सरसकट समाज रस्त्यावर आलेला तुम्ही कधी पाहिलाय का एका विनोदासाठी? विशिष्ट पाच-पंचवीस लोकच झेंडे घेऊन तुमच्यापर्यंत येतात आणि ते त्या समाजाचे प्रतिनिधी म्हणून तुमच्याशी भांडत बसतात. त्यातले काही मग प्रतिक्रिया म्हणून ‘आमचा निषेध’ एवढंच म्हणतात. तर मी असं पाहिलंय की अशा प्रकरणांमध्ये त्याच वर्गातले अनेक जण ‌‘अरे हा साधा विनोद होता रे! याच्यात काही नव्हतं,’ असं म्हणणारे, भांडणारेही मी खूप पाहिलेत या अशा प्रकारच्या वादामुळे! पण यामुळे सरसकट समाजाला आपण दोष नाही देऊ शकत. सरसकट समाजच आता दूषित झालाय असं नाहीये. एका विशिष्ट वर्गाने, समाजाने त्याचा प्रतिनिधी म्हणून अत्यंत वाईट रूप आपल्यापुढे मांडलंय. खरं म्हणजे मला वातावरण खूप स्वच्छच दिसतंय.

सचिन मोटे : तू म्हणतोस ते बरोबर आहे. या मुद्द्याशी मी सहमत आहे. त्यांच्या समाजाचे जे नेते आहेत त्यांना हे हवंच आहे, की मी याच्यामुळे दुखावला गेलोय म्हणून. पण दुसरीकडे मला असं वाटतं, आता आपण बघू शकतो, की आता तुम्ही संतासिंग, बंतासिंग असं म्हणू शकत नाही. अख्खा समाज प्रभावित होतो. आता ब्रिटनमध्ये रॉयल डायल नावाचा जो लहान मुलांचा प्रचंड गाजलेला साहित्यिक आहे, त्याच्या पुस्तकांमध्ये आता फेरसंपादन चाललं आहे. त्यातील टक्कल, जाडेपणावरील विनोद आता काढून टाकत आहेत. आज समाज खूप संवेदनशील, भित्रा आणि हळवा व्हायला लागला आहे. का असा व्हायला लागला आहे, कळत नाही. मृत्यूवरचे विनोद म्हटल्यावर माणसं आता रडायला लागतात. त्यांना वाटतं आपलंच कुणी जाणार आहे म्हणून! विनोदात जो एक हेल्दीनेस होता तो कमी कमी होत चाललाय.

श्रीपाद ब्रह्मे : त्याच मुद्द्यावर मी येणार होतो. जो निरोगी समाज आपण म्हणतो की जो विनोद सहज पचवू शकतो, सहन करू शकतो आणि ऐकू शकतो आणि त्याच्यात स्वत: हसणारा समाज हा प्रगल्भ किंवा मोकळा मानला जातो. जसं एके काळी ब्रिटिश समाजाबद्दल बोललं जायचं. आता तिथली परिस्थिती आपल्याला माहीत आहे. त्याला जोडून मला तुम्हाला एक विचारायचंय. एकूण जेव्हा आपण टीव्हीसाठी काही करतो तेव्हा अर्थातच आपल्याला एवढ्या व्यापक प्रेक्षकाच्या बौद्धिक क्षमतेचा एक लसावि काढून विनोद करावा लागतो. आपण एवढ्या मोठ्या टेलिव्हिजनच्या ऑडियन्ससाठी विनोद करतोय तर त्याच्यापेक्षा चांगल्या दर्जाचा विनोद आपण देऊ शकतो लोकांना, असं तुम्हाला कधी वाटतं का?

सचिन गोस्वामी : दोन नाही तर बारा-पंधरा पायऱ्या खाली येऊन विनोद करावा लागतो. हे बघा, कसं आहे की हा इतका मोहक व्यापार आहे की याच्यातली खंत आणि याच्यातून मिळणारा प्रतिसाद याच्यात खंत बाजूला ठेवावी लागते. गणेशोत्सवातील कलावंत घडण्याची जी परंपरा होती आपल्याकडे ती नाटकातनं यायची. गणेशोत्सवात पूर्वी नाटकं सादर व्हायची. राज्य नाट्य, एकांकिका स्पर्धा या त्या पायऱ्या आहेत. त्यतून नाटकाद्वारे सामान्य माणसातल्या कलावंताला जागं करण्याची एक क्षमता होती ती गणेशोत्सवात होती. अनेक कलावंत गणेशोत्सवातून तयार झाले आहेत. आता ते संपलंय. कारण आमच्यासारखे ‘ट्वेंटी-२०’चे उपक्रम करणारी जी मंडळी आहेत त्यांनी ते नासवून टाकलंय. आता नाटकांना कोणी निमंत्रितच करीत नाहीत. आमच्याच चार जोड्या बोलावतात. ते दहा-दहा, पंधरा-पंधरा मिनिटं दोन सोफे टाकून विनोद करतात. असं दीड दोन तास केलं तरी संपून जातं. दोन तास एक पात्र जगणं, एक परिसर दोन तास उभा करणं, एक भासमान दृश्य, त्याचा परिसर आणि त्या घटनाक्रमातून असंख्य प्रेक्षकांना आपल्या बरोबरीने प्रवास करायला लावणं ही जी सगळी प्रक्रिया होती ती सगळी संपली! दहा-पंधरा मिनिटांच्या विनोदात ते सगळं संपवून टाकलंय आपण. आम्ही गंभीर स्किट्स, तर कधी हृदयद्रावक स्किट्सही करतो; पण त्याला कोणी बोलवत नाही. हे सगळं उथळ उथळ होत चाललंय. त्याला कारणीभूत आम्हीसुद्धा आहोत. मान्य केलंच पाहिजे ते, कारण आमचीच वाढ मुळात अशा अत्यंत सुदृढ अशा सांस्कृतिक परंपरेतून झाली. पण दुर्दैवाने आता ती परंपरा खंडित होतेय, त्याला आम्हीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जबाबदार आहोत. तुम्ही म्हणाल ‘हास्यजत्रा’तल्या विनोदांचं काय? तर आम्ही सतत म्हणत असतो, की माणसाची भूक मोठी की आपलं देणं मोठं आहे? हे नेमकं उन्हातान्हात, दुर्गम ठिकाणी मोर्चाला वडापावची गाडी मिळण्यासारखा प्रकार आहे. आणि मग दोन वाजता भूक लागली आहे तुम्ही कमी मिठाचा वडापाव दिला तर तो चविष्ट म्हणून खाल्लाच जातो. तशी काहीशी टेलिव्हिजनमधली आमची अवस्था आहे. हा भाग वेगळा आहे, की आम्ही जास्तीत जास्त दर्जा ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यातल्या त्यात कन्टेंट चांगला असावा याचा प्रयत्न आम्ही करतो. पण एकूण म्हणाल, तर प्रेक्षक वाढणं आणि प्रगल्भ प्रेक्षक निर्माण होणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रगल्भ प्रेक्षक निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रेक्षक संख्या कमी असते आणि प्रेक्षकसंख्या जर मोठ्या प्रमाणात वाढवायची असेल तर तेथे प्रगल्भता ही दुय्यम आहे. सध्या आम्ही त्या फेजमध्ये आहोत. कारण आम्ही मोठा प्रेक्षक तयार करतो ही त्यात जमेची बाजू आणि आनंदाची गोष्ट आहे. पण त्यात प्रगल्भता आहे का? दर्जा आहे का? तर त्याला तुम्हाला दुय्यम ठेवायला लागतं. आणि हे दुष्टचक्र आहेच. हे सगळ्याच कला, साहित्याच्या बाबतीत आहे. तुम्हाला व्यापक वाचक असेल तर लिखाणातील खोली थोडी कमी असते. तुम्हाला कल्पना आहे, की खूप जीवनविषयक गंभीर तत्त्वज्ञान सांगणारी पुस्तकं थोडी जाड असतात, वजनदार असतात आणि कमी विकली जातात, कमी वाचली जातात. जीवनाचं रंजक चित्रण करणारी छोटेखानी पुस्तकं जास्त विकली जातात. हा सगळा परिस्थितीचा भाग आहे. त्याचे त्या रहाटगाड्यातले आम्हीसुद्धा वाटेकरी आहोत.

श्रीपाद ब्रह्मे : हा ॲकॅडमिक प्रश्न होता पण व्यावहारिक यश म्हणाल तर या कार्यक्रमाचं भरपूरच महत्त्व आहे की ते दिसतंय आपल्याला.

सचिन गोस्वामी : मात्र आम्ही मुळीच भ्रमात नाही. आम्ही आता काही तरी दर्जेदार दिलं आहे, अशा भ्रमात आम्ही कधीच राहू शकत नाही. ते ते त्या त्या काळाशी संबंधित ते ते यश आणि ती ती गोष्ट आहे. दहा वर्षांनी अजून बघाल, कदाचित मीच माझे कार्यक्रम बघेन तर मला ते उथळ वाटतील. कारण यापूर्वी मी केलेले कार्यक्रम मला उथळ वाटत होते. कारण आपण पण परिस्थितीनुसार प्रगल्भ होत असू, स्वत:ची वाढ होत असेल तर आपणच केलेलं थोडं थोडं उथळ वाटणं स्वाभाविक आहे. पुढच्या प्रेक्षकांनाही वाटेल. पण आज असं आहे, की उपलब्ध रंजनामध्ये त्यातल्या त्यात बरं रंजन आम्ही देतो.

श्रीपाद ब्रह्मे : कमिटेड किंवा जास्त प्रामाणिक राहून किंवा त्या कलाकारांमधले सगळं चांगलं काढून घेणे, त्यासाठी भरपूर मेहनत घेणं, कमिटेड राहणं हे सगळे चांगले गुण दिसलेच. खरं तर आम्ही जेव्हा कलाकारांशी बोलतो त्या वेळी आम्ही जर एक लसावि काढला असेल तर तो हाच होता की तुम्ही दोघंही इथं आहात म्हणून हे सगळं चाललंय. 

सचिन गोस्वामी : यातला विनोद निर्विष आहे. द्यायचं ते बेस्ट द्यायचं आहे. रथाला कोणी तरी सारथी लागतो. आणि सारथी जागा लागतो. तो झोपायला नको.

श्रीपाद ब्रह्मे : ज्याला ‘कॅप्टन ऑफ द शिप’ म्हणतात. आम्ही प्रत्येकाची वेगवेगळी मुलाखत घेतली आहे. एकत्र नव्हती. प्रत्येकाच्या बोलण्यात हे आलं की हे दोघं आहेत म्हणून आमचं व्यवस्थित चाललंय. आम्हाला त्यांनी चांगली दिशा दिली. आमचं पात्र त्यांनीच विकसित केलं. आमच्यातलं जे काही चांगलं आहे ते त्यांनी काढून घेतलं. मी काय करू शकतो हे त्यांना बरोबर माहिती आहे. मला एक वेळ माहिती नाही; पण त्यांना माहिती आहे इतकं लोकांनी सांगितले ते मला वाटतं तुमच्या दोघांचं निखालस यश आहे आणि त्या कार्यक्रमाचंही तेच यश आहे, असं वाटतं.

सचिन गोस्वामी : या कार्यक्रमाचे मूळ यश जे आहे ते नटांचे आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमाचा कच्चा माल म्हणजे त्याची गोष्ट आहे. कन्सेप्ट्‌‍स, विविध परिसर सतत मिळणं कारण रचणं हे तर माझ्यासारख्या अजून अनेक लोक आहेत जे करू शकतील; पण सचिन आणि आमची लेखकांची टीम जे काम करते, ते मी आज ठामपणे सांगू शकतो, की असं करणारी टीम माझ्या पाहण्यात नाही आणि कदाचित महाराष्ट्रात पण नाही. इतक्या समर्पित वृत्तीने ही सगळी मंडळी काम करतात. मीसुद्धा त्या ग्रुपमध्ये असतो म्हणजे मी टीमचाच भाग आहे. पण मी प्रामाणिकपणे सांगतो, की मी बाजूला असतो म्हणजे मी ‘अप्रूव्हल’ या पातळीवरच काम करतो. एखादा विषय झाला म्हणजे ‌‘याच्यात मजा नाही' एवढंच मला म्हणायचं असतं किंवा हा विषय वर्क होईल किंवा नाही हे सांगायचं असतं. माझं फार मोठं काँट्रिब्यूशन नाही; पण ही लेखक मंडळी काम करतात, त्यांच्यात सचिनचा सगळ्यात मोठा वाटा आहे. हे मला यासाठी सांगावंसं वाटतं, कारण तो एक विशिष्ट पद्धतीचा स्टोरीटेलर आहे. विषय येतात तेव्हा त्याची जी गोष्ट तयार करणे आहे ही फार गमतीची प्रक्रिया आहे. हा एक गोष्ट रेकॉर्ड करून प्रत्येक लेखकाला देतो. त्यातून जे मुद्दे निघतात त्याचं एका संपूर्ण गोष्टीत सचिन रूपांतर करतो. लेखक व कलाकारांमध्ये ही प्रचंड मोठी क्षमता आहे आणि ती क्षमता आमच्याकडं आहे म्हणून आम्हाला कच्चा माल मिळतो आहे. म्हणून आम्ही त्याचे प्रॉडक्ट करू शकतो. नाही तर हे अशक्य आहे. आमची लेखक मंडळी आहेत म्हणून मी निश्चिंत असतो, की उद्या हे काही तरी आणून देतीलच. कच्चं-पक्कं असेल तर ठीक आहे. तिथे आमचं काही रिपीटेटिव्ह होत असेल. आम्हालाही जाणवतं ते! कारण शेवटी मेंदू आहे, परिसर तोच आहे, संचित तेवढंच आहे. मध्ये दीड-दोन महिने चॅनेल आम्हाला सोडतं म्हणून फिरतो आम्ही. चार नवीन माणसं पाहायला मिळतात, पण हे वैशिष्ट्य आहे की या सगळ्या कार्यक्रमाचे सगळ्यांत मोठे यश हे आमच्या लेखकांच्या दीड दिवसाच्या मेहनतीचं आहे. बाकी नटमंडळी, सगळी मंडळी नंतर मेहनत करतोच; पण सगळ्यात मूळ तेच आहे की बीज शुद्ध आहे म्हणून ही फळे रसाळ तयार होतात.

श्रीपाद ब्रह्मे : इथे लेखकांचा अगदीच महत्त्वाचा भाग सांगितलात. कारण लेखक शेवटी शब्दांचे धनी! मीसुद्धा थोडा लेखक असल्यामुळे अगदी सांगूच शकतो, की त्यांच्या यातना काय प्रकारच्या असतात! या लेखक व्यवसायाशी निगडित असं अक्षरधारा हे पुस्तकांचं एक दुकान आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ग्रंथ आणि त्याची विक्री यांचा ते प्रसार करत असतात. त्या अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचंय की विशेषत: सर्व जडणघडणीमध्ये आपले ग्रंथ, वाचनसंस्कृती याविषयी तुमचं म्हणणं काय आहे? या ‘अक्षरधारा’सारख्या संस्थांना हे फार गरजेचे वाटतं, की लोकांपर्यंत पुस्तक पोहोचली पाहिजेत, वाचली पाहिजेत; पण एके काळी माध्यमात तुम्ही पण आत्ता काम करत आहात, त्याचीच खूप मोठी आव्हाने आहेत. त्याच्यापुढे इंटरनेट आहे, मोबाइल आहेत, की जे लोकांना एका शरीराच्या अवयवासारखे चिकटलेले आहेत. मग या परिस्थितीत मग जर मुळात ते वाचलं गेलं नाही तर तुमच्यासारखे लेखक कसे तयार होणार? असे कार्यक्रम तरी पुन्हा कसे येणार? मुळातच ऑडिओ-व्हिडिओ मीडियमलाच शत्रू मानलं जातं तर त्याच्यात लेखक कसे येणार, ही चिंतेची गोष्ट आहे असं तुम्हाला वाटते का? 

सचिन मोटे : चिंतेची गोष्ट आहे, पण काळ जसजसा बदलतो आहे तसं तसं साहित्यसुद्धा त्याचा मार्ग शोधत चाललंय असं मी सध्या बघतोय. आता सध्या ऑडिओ बुक्स पण लोक खूप ऐकायला लागले आहेत. मराठीतल्या खूप चांगल्या चांगल्या कादंबऱ्या लोक बारा बारा तास ऐकायला लागले आहेत. माध्यम बदलत चाललंय.

श्रीपाद ब्रह्मे : म्हणजे ते कन्झ्युम करणं आहे. 

सचिन मोटे : हो ते कन्झ्युम करणं आहेच. मला तर असं वाटतं, की खूप वेगवेगळ्या पद्धतीने पुस्तक पोहोचवण्याचे प्रयत्न तुम्ही करताच आहात, ते जर या माध्यमाला अनुकूल होत चालले तर अधिक उपयुक्त होईल. जर आपण असं केलं की चांगल्या चांगल्या नटांनी आपल्याला आवडलेले उतारे जरी रीलमध्ये ५०-५० सेकंदांचे वाचून दाखवले, या पुस्तकातली ही दहा वाक्यं, तरीही ते चांगलं होईल. शेवटी जिकडे प्रेक्षक जातात तिकडेच कलाकार जातात आणि तिकडेच आपल्यालाही जावं लागणार. आपलं साहित्य असलं तरी त्यांच्या इथं जाऊन ते पोचवणं आपलं काम आहे. जे वृत्तपत्र आपण पूर्वी वाचत होतो त्यातले पत्रकार आता रीलवर दिसायला लागले आहे. ते आता ४० सेकंदांचा रील बनवून आपले विचार पोचवण्याचा प्रयत्न करतात.

श्रीपाद ब्रह्मे : यू-ट्यूबचे चॅनेल काढतात. लेख लिहिण्याऐवजी ते बोलून दाखवतात.

सचिन मोटे : आता वाचनाचे पेशन्स कमी होत चालले आहेत. आज ‘हास्यजत्रा’सुद्धा बारा मिनिटांचे आहे म्हणून बघतात. ४५ मिनिटांचे स्किट केले तर कदाचित विसाव्या मिनिटाला बंद होईल. लोकांचे ‘अटेन्शन स्पॅन’ कमी होत चालला आहे. त्यातूनही एक प्रेक्षकवर्ग आहे, जो आजही वाचक आहे. आज कुठल्याही ग्रंथ प्रदर्शनाला गेलो तर पुस्तक विकत घेणारे खूप लोक असतात. आता काही विशिष्ट पुस्तकं जास्त खपतात, काही खपत नाहीत; पण या ज्या पूर्वीपासूनच्या समस्या आहेत त्या आहेतच. पण आव्हानेही खूप मोठी आहेत. पण मराठी साहित्य यातून कायम पुढे पुढे जात राहिलं आहे. आपल्याला तयारी ठेवायला लागेल. भाषा बदलेल; एक वेगळीच भाषा तयार होईल. या पिढीची भाषा त्यात येईल, पण हे सगळं पुढे जाईल. 

सचिन गोस्वामी : गंमत म्हणजे, मुळातच आपली भारतीय मानसिकता वाचनाची नाहीच आहे. आपण श्रवणाने ज्ञान संपादन करणारे आहोत. कीर्तनातून शिकणारे, ओव्यांतून शिकणारे. वाचनपरंपरा ही पाश्चात्त्यांनी आणलेली आहे. लेखन ही संकल्पना त्यांच्याकडूनच आली. आपल्या रक्तातच आहे की कोणी तरी येऊन मला गोष्ट सांगा. मला वाचायला लावू नका. मला तू सांग ना गोष्ट. म्हणूनच या ऑडिओ बुक्सकडे मुले का वळायला लागली आहेत, कारण त्यांना अक्षराच्या मागे धावायचंच नाही. पूर्वीही आपला समाज कीर्तनाने समृद्ध होतच होता. बहुश्रुत असायचे लोक.

सचिन मोटे : आणि तिथून तो पुन्हा वाचनाकडे जाईल. अर्धा तास ऐकलेलं पुस्तक मी वाचायला घेईन, आता हे मी वाचून बघतो म्हणून. 

श्रीपाद ब्रह्मे : तुम्ही म्हणालात तो मुद्दा अगदी बरोबर आहे. हा फार कमी वेळा मांडला जातो. खरोखर आपला समाज हा जास्त ऐकणारा आहे आणि वाचण्याकडे जायचं म्हणजे तुम्हाला अनेक स्किल्सची गरज असते. सगळ्यात पहिला म्हणजे तुम्ही साक्षर असला पाहिजे, वाचता आलं पाहिजे आणि ऐकायला काही बंधन नाही ते तुम्ही तसे कन्झ्युम करू शकता. 

सचिन गोस्वामी : आजी आपल्याला अशी गोष्ट सांगत नाही ना की हा होता श्रावणबाळ. आजी मांडीवर झोपवते आणि ती तिच्या भाषेत श्रावणबाळ सांगते. आमच्यावर संस्कारच ते आहेत.

श्रीपाद ब्रह्मे : म्हणजे आता आपण असे म्हणू शकतो, की वाचनाची संस्कृती वाढण्यासाठी ऐकण्याची संस्कृती वाढली पाहिजे. तिच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. आधी तुम्ही हे त्यांना ऐकवा आणि मग ते पुन्हा वाचनाकडे जातील.

सचिन गोस्वामी : अजूनही गाडीने जाताना मी गाणी ऐकण्याऐवजी श्रुतिका ऐकतो ती काही मिनिटं असतील, एक-दीड मिनिटाच्या लव्ह स्टोरीपासून ती काहीही असेल, बडबड चाललेली बरं वाटत असतं ऐकायला ही आपली मानसिकता आहे. 

श्रीपाद ब्रह्मे : वा खूप चांगला संवाद झाला आहे. मला असं वाटतं, की खूप वेळ आपण या दोघांबरोबर बोलू शकतो. पण वेळेची मर्यादा आहे. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या दोघांनाही मी धन्यवाद देतो. त्यांनी ‘अक्षरधारा’साठी ‘हास्यजत्रा’च्या निर्मितीची चांगली माहिती आम्हाला दिली... सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा.

धन्यवाद !

----

भाग २ मध्ये समीर चौघुलेची मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

---------------