21 Dec 2013

फर्स्ट डे फर्स्ट शो धूम-३

फक्त आमिर & आमिर...
-------------------------




'धूम' मालिकेतल्या तिसऱ्या भागात खलनायकाची भूमिका आमिर खान साकारणार आहे, ही बातमी ज्या दिवशी फुटली त्याच दिवशी हा टोटली आमिर खानचा सिनेमा असणार, हे नक्की होतं. (कारण कथित नायक-नायकाची जोडी अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा हीच ठरलेली आहे. ती राष्ट्रीय तरुण बेरोजगार योजना की काय... त्याअंतर्गत!) पण सिनेमा प्रत्यक्षात बघितल्यावर त्यात थोडी भर घालून म्हणावंसं वाटतं - की हा फक्त आमिर आणि आमिरचा सिनेमा आहे! आमिर खान हाच सिनेमाचा महानायक आहे. सिनेमा सुरू झाल्यानंतर साधारण दहाव्या मिनिटाला आमिरचं पडद्यावर दर्शन होतं आणि ते शेवटच्या फ्रेमपर्यंत कायम राहतं. आमिरच्या याआधीच्या सिनेमांप्रमाणे याही सिनेमात त्यानं संपूर्ण फोकस आपल्यावर राहील, याची काळजी घेतली आहे. त्याच्या सव्वापाच फूट उंचीच्या देहात संपूर्ण पडदा व्यापण्याची क्षमता आहे. त्या अर्थानं आमिरच्या चाहत्यांना हा सिनेमा म्हणजे त्याच्याकडून आणखी एक ट्रिट आहे. पण...
हा 'पण...' अनेक गोष्टींत लागू आहे. आमिर खान त्याच्या सिनेमाच्या पटकथेवर (पुष्कळ ढवळाढवळ करून) काम करतो, असं ऐकलं होतं. पण 'धूम-३'ची पटकथा अत्यंत विस्कळित आणि अस्ताव्यत आहे, हे आमिरच्या लक्षात आलं नाही? 'धूम-३'सारख्या अॅक्शन सिनेमाला ज्या किंचित रहस्याची डूब देऊन हा सारा डोलारा उभा केला आहे, ते किती कमकुवत आहे, याची कल्पना या बुद्धिमान नटाला आली नसावी? आमिर स्वतःच्या व्यक्तिरेखे(खां)वर भरपूर मेहनत घेतो, स्वतःच्या लूकवर खूप काम करतो, प्रत्येक फ्रेममधील त्याचं अस्तित्व नीट चाचपून घेतो, हे सर्वांनाच माहिती आहे. इथंही त्यानं ते केलंच आहे आणि त्याबद्दल त्याला सलाम... पण बाकीचं काय? बहुदा बाकीच्या पात्रांची मांडणी, उभारणी आणि त्यांचा कथेतला प्रवास, कथेतील ट्विट्स अँड टर्न्स आदी सर्वच बाबी त्यानं दिग्दर्शकावर सोडून दिल्या असाव्यात. अर्थात त्या दिग्दर्शकानंच पाहणं अपेक्षित असतं. पण आमिर खानचा सिनेमा अशा सर्वच बाबींना अपवाद असतो, म्हणून ही तक्रार. कारण आमिर खान या नावाचं वलय आणि त्याच्याकडून असणाऱ्या अपेक्षा वेगळ्या असतात. नाही तर अन्य खानांमध्ये आणि त्याच्यात फरक तो काय राहिला?
एकापेक्षा एक अतर्क्य आणि प्रेक्षकांच्या किमान बुद्धीलाही आव्हान देणाऱ्या प्रसंगमालिकांनीच हा सिनेमा सुरू होतो आणि काळजाचा ठोका क्षणभर चुकतो. विशेषतः जय (अभिषेक बच्चन) आणि अली (उदय चोप्रा) यांची एंट्री ज्या गावठी आणि बी ग्रेडच्या दृश्यानं (इथं दिग्दर्शकाला कॉमेडी अपेक्षित असावी...) होते, तिथं तर सिनेमा पूर्ण हातातून गेला, असंच वाटून जातं. पण सुदैवानं नायकाच्या संघर्षाला प्रारंभ होतो आणि सिनेमा पुन्हा ट्रॅकवर येतो. शिकागोत नव्वद सालात द ग्रेट इंडियन सर्कस चालविणारा इक्बाल खान (जॅकी श्रॉफ) आणि कर्जफेड केली नाही म्हणून त्यावर जप्ती आणणारी वेस्टर्न बँक ऑफ शिकागो यांच्यातील संघर्षात इक्बालचा बळी गेलेला त्याचा मुलगा साहिर (सिद्धार्थ निगम) पाहतो. हाच मुलगा मोठा साहिर (आमिर) होऊन बँकेला धडा शिकवण्याच्या मागे लागतो. आता इथं (सब)नायक-नायक जोडी भारतातून येण्यासाठी काही तरी निमित्त हवं. मग त्यासाठी महानायक सगळीकडं कोळशानं हिंदीतून बँक की ऐसी की तैसी वगैरे लिहून ठेवत असतो... (आता अमेरिकेत ढिगानं असलेले कोणीही भारतीय हे काय लिहिलंय हे सांगू शकलं असतं. पण मग जय आणि अली तिथं येणार कसे? असो.) इथून पुढं मग बाइक्सची थरारक धूम, पाठलाग वगैरे साग्रसंगीत पार पडतं. (ही दृश्यं चांगलीच आहेत, पण आता तो दर्जा या सिनेमात अपेक्षितच आहे...) मग मध्यंतराला गोष्टीतला तो (किंचित) ट्विस्ट येतो. वास्तविक हिंदी सिनेमे पाहणारा कोणीही माणूस हे रहस्य लगेचच ओळखील. पण तरीही इथं ते सांगत नाही.
मग उत्तरार्धात या किंचित रहस्यानं निर्माण झालेला गुंता सोडवण्याचा जय आणि अली यांचा प्रवास आणि महानायकाचं त्यांना चकवा देत पळणं हा भाग बऱ्यापैकी खिळवून ठेवतो. त्यात काही उपकथानकासारखाही भाग येतो. अरे हो, या सिनेमाला एक नायिकाही आहे हं अलिया (कतरिना) नावाची. महानायकासमोर पाच मिनिटांचा (अक्षरशः 'स्टनिंग' असा) डान्स करून ती त्याच्या सर्कसमध्ये दाखल होते आणि महानायकाला नायिका हवी, ही महत्त्वाची गरज पूर्ण करते. मग पुढं त्यांचं प्रेमप्रकरण वगैरे. पण तो भाग थोडा किंचित रहस्याशी संबंधित असल्यानं सविस्तर सांगता येत नाही. तर हे सगळं होतं आणि अपेक्षेप्रमाणं सबनायकांच्या हातून मार खाऊन मरण्यापेक्षा महानायक वेगळा मार्ग निवडतो, हे सांगायला नको. वेगानं खाली जाऊन महानायकाला अंतिमतः मोठी उंची प्राप्त होते, हे ओघानं आलंच!
या सिनेमाला खाली नेणारी, पण अंतिमतः मोठी उंची प्राप्त अजिबात न करून देणारी आणखी एक गोष्ट म्हणजे त्याची लांबी. सुमारे तीन तासांचा हा सिनेमा असून, एवढ्या लांबीची मुळीच गरज नव्हती. मात्र, विस्कळित पटकथेवर त्याचा सगळा दोष जातो. तरीही यात आयटेम साँग नाही, ते एक बरंय.
प्रीतम यांचं संगीत ठीक आहे. मलंग मलंग हे गाणं आणि त्याचं चित्रिकरण अप्रतिम आहे, यात वाद नाही. आमिर, कतरिना यांनी नृत्य आणि सर्कशीतले बरेच कायिक प्रकार लीलया केले आहेत आणि डमी न वापरता त्यांनी हे केलं असेल, तर त्यांचे खास कौतुक. अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा त्यांची कामं नेहमीच्या सफाईनं करतात. मात्र, दुर्दैवानं आमिरसमोर त्यांना अजिबातच स्कोप नाही. सुरुवातीला छोट्या भूमिकेत जग्गूदादा उत्तम.
तेव्हा आमिरचे चाहते असाल, तर नक्की पाहा. कतरिनाचे असाल, तर अं... ओके. बघा. अभिषेक बच्चन आणि उदय चोप्राचे कुणी आहेत काय?
---

निर्मिती : यशराज फिल्म्स
दिग्दर्शक : विजय कृष्ण आचार्य
संगीत : प्रीतम
सिनेमॅटोग्राफी : सुदीप चटर्जी
प्रमुख भूमिका : आमिर खान, अभिषेक बच्चन, उदय चोप्रा, कतरिना कैफ, जॅकी श्रॉफ
दर्जा : ***१/२
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, २१ डिसेंबर २०१३)


17 Dec 2013

'जंबिया मधाचा...'


कौशिकी चक्रवर्तीचं गाणं ऐकताना अडचण एकच येते. ती म्हणजे डोळे बंद करून तिचं गाणं ऐकता येत नाही. म्हणजे तसं करायला गेलो, तर कान आणि डोळे यांच्यात भांडणच सुरू होतं! पण हे देखणं स्वरशिल्प अनुभवताना एका गोष्टीत मात्र स्वतःचंच एकमत होतं, ते म्हणजे ऐंद्रिय अनुभूतीच्याही पार नेणारं काही तरी आपण ऐकत आहोत... परवा सवाई गंधर्व महोत्सवाच्या स्वरमंचावर कौशिकीचं गाणं ऐकताना माझं मन नकळत भूतकाळात गेलं. स्वतः कौशिकीनंही तिच्या या मंचावरच्या पहिल्या हजेरीचा अनुभव सांगितला. त्या वेळी चहा प्यायला बाहेर न गेलेल्यांपैकी मी एक होतो आणि तेव्हाचं तिचं ते गाणं ऐकून मी तेव्हाच तिचा फॅन झालो होतो....
कौशिकीचा जन्म १९८० चा. म्हणजे सवाई गंधर्व महोत्सवात ती पहिल्यांदा गायिली तेव्हा, तर तिनं तिशीही ओलांडली नव्हती. तेव्हाच तिचं गाणं ऐकतानाच लक्षात आलं होतं, की हे प्रकरण काही तरी निराळं आहे... मला शास्त्रीय संगीतातलं खूप कळतं, असं अजिबात नाही. व्याकरण तर नाहीच कळत... पण तरीही कौशिकीचं गाणं आवडतं. ते गाणं समजतं. याचं कारण कौशिकीचं गाणं हे आजच्या तरुणाईचं गाणं आहे. भारतातल्या नव्या पिढीची सर्व लक्षणं तिच्या गाण्यात दिसतात. लहानपणापासून झालेले गाण्याचे संस्कार, आत्मविश्वास, जग जिंकण्याची दुर्दम्य आकांक्षा आणि त्यासाठी वाट्टेल तेवढी मेहनत घेण्याची तयारी ही या पिढीची सहज दिसणारी लक्षणं आहेत. विश्वनाथन आनंद, सचिन तेंडुलकर यांच्यापासून प्रेरणा घेणारी ही पिढी आहे. तिच्या गाण्यात तिच्या व्यक्तिमत्त्वातला अवघा गोडवा उतरतो आणि आणि तो ऐकणाऱ्याला वेडं करतो. आपल्याकडं असलेल्या गुणांची, बलस्थानांची नेमकी जाणीव असणं हेही या पिढीचं लक्षण आहे. कौशिकीलाही ती आहे. मैफली कशा जिंकायच्या, याचं एक शास्त्र आहे. ते तिनं पुरेपूर अंगीकारलं आहे. अनेक मोठमोठे गायक विनम्र भावाचं प्रदर्शन करतात. कौशिकीही तसंच बोलते. मात्र, तिचं हे बोलणं मनापासूनचं वाटतं. ते खोटं, कृत्रिम वाटत नाही. तिच्या गाण्यासारखाच तिच्या व्यक्तिमत्त्वातला तो लखलखीत पारदर्शीपणा बावनकशी सोन्यासारखा अस्सल आहे.
तिचे पिता आणि गुरू पं. अजय चक्रवर्ती यांनी कौशिकीवर आणि तिच्या गाण्यावर घेतलेली मेहनत जाणवते. अर्थात गाताना ती एवढ्या सहजतेनं गाते, की शास्त्रीय संगीत गाणं खूप सोपं आहे, असं वाटावं. आणि असं वाटायला लावणं यातच तिचं यश आहे. सूरांवरची तिची हुकमी पकड कळतेच. शिवाय पल्लेदार ताना, मुरके, खटके, हरकती आदी शास्त्रीय संगीतातल्या अनेक गोष्टी ती लीलया करते. कधी तरी वरचा सूर लावताना तिचा आवाज किंचित किनरा होतो. पण हा दोष न वाटता, ती तो इतक्या आकर्षक पद्धतीनं सादर करते, की बस्स... मला खरोखर त्यातल्या तांत्रिक बाबी कळत नाहीत. शास्त्रीय संगीताच्या समीक्षकांच्या दृष्टीने तिचं गाणं कसं आहे, हे मी सांगू शकत नाही. मात्र, सूरांचं नातं ऐकणाऱ्याच्या हृदयाशी असतं, एवढं मला कळतं. कौशिकीच्या गाण्यातल्या काही जागा अशा असतात, की बोरकरांच्या भाषेत तो 'जंबिया मधाचा... कलिजा चिरत' जातो... त्या ताना ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात... आपलं संपूर्ण शरीर त्या सूरांवर डोलत असतं. हृदयात कसलीशी तीव्र स्पंदनांची कारंजी उसळत असतात आणि वाटत असतं, की हे सूर असेच कानी पडत राहावेत...
कौशिकीसाठी हजारोंच्या संख्येनं त्या मंडपात उपस्थित राहिलेल्या अनेक रसिकांचीही हीच भावना असणार. अगदी थोड्या कालावधीत या गायिकेनं आपली सर्वांगसुंदर स्वरमुद्रा सर्वांच्या हृदयावर उमटवली आहे. म्हणून तर तिचं गाणं संपल्यावर आता काही ऐकूच नये, असा सार्वत्रिक भाव तिथं उमटला. तिचं गाणं संपल्यानंतर रसिकांनी किती तरी वेळ टाळ्यांचा कडकडाट करून आणि उभं राहून तिला जी दाद दिली, ती पुरेशी बोलकी होती. कौशिकीचं गाणं पुणेकरांना मनापासून भावलं आहे आणि ही गायिका त्यांच्या गळ्यातली ताइत बनली आहे, हे सिद्ध करायला आता आणखी कुठल्याही पुराव्यांची गरज नाही. भारतात शास्त्रीय संगीताला किती उज्ज्वल भवितव्य आहे आणि पुढची पिढी किती समर्थपणे ही परंपरा पुढं घेऊन चालली आहे, हे पाहायला पं. भीमसेन जोशी त्या सभामंडपात हवे होते... अर्थात अण्णांचा आणि त्यांच्या सर्व पूर्वसूरींचा आत्मा त्या वेळी नक्कीच तिथं असणार आणि त्यांनी या गुणवती गायिकेवर आशीर्वादांच्या सूरांच्या लडीवर लडी उधळल्या असणार, असं वाटावं एवढं त्या वातावरणात भारावलेपण आलं होतं.
काही काही गोष्टी समीक्षेच्या किंवा रुक्ष गणिती मोजपट्टीच्या हिशेबापलीकडं असतात... कौशिकीनं शेवटी गायिलेल्या त्या एका याद पिया की आये...वर दिल आणि जान दोन्ही कुर्बान...
पुढची कित्येक वर्षं तिनं आपलं आयुष्य असंच सुरेल करावं, एवढंच त्या जगन्नियंत्याकडं मागणं...





9 Dec 2013

आणखी काही कविता...

आणखी काही कविता
---------------------

४. तू..
------

तू एक सुंदर स्वप्न आहेस,

तू हळूवारपणे गालावर फिरणारं मोरपीस आहेस,

तू शिशिरातील पानगळीवर मात करणारी वसंत आहेस,

तू एक बहर आहेस,

तू तृषार्त चातकाची टपटप रिमझिम आहेस,

तू भेगाळलेल्या वसुंधरेची बरसात आहेस,

तू थंडीवर मात करणारी ऊब आहेस,

तू पहाटेचं कोवळं दंव आहेस,

तू रिकाम्या मनाच्या गाभाऱ्यातील निःशब्द शिल्प आहेस,

तू विराण वाळंवटातील हिरवंगार 'ओअॅसिस' आहेस,

तू ओसाड, पडीक माळरानावरली कोवळी हिरवळ आहेस,

तू अमावस्येच्या रातीची शांत, निश्चल समई आहेस,

तू एक नंदादीप आहेस,

तू आकाशतारकांच्या अंगणातली ध्रुव आहेस,

तू अफाट दर्यावरल्या छोट्याशा नावेची दीपस्तंभ आहेस,

तू खरं तर एक जिवंत भास आहेस,

छे! तू तर माझी आला-गेला श्वास आहेस!!!

- आनंदीनंदन

(१९ ऑक्टोबर १९९३, पुणे)
---

५. प्रवास
---------

अंधारलेल्या संध्याकाळची साथ धरून,
क्षणिक वावटळीने दूरदूर जाणाऱ्या,
क्षणात् मान टाकणाऱ्या
पिवळ्या पानांकडे हेव्याने पाहून,
मी रस्त्याने अडखळत जात असतो,
तेव्हा तुझ्याच सोबतीतल्या दिवसांच्या
आठवणींचा प्रकाश वाट दाखवीत असतो,

फार फार दिवसांपूर्वी मी लहान होतो,
लहान कसला, इवल्याशा रोपट्याचे
इवलेसे पान होतो,
बालपण सरले, 'तारुण्य' म्हणजे काय
ते कळण्याच्या आतच प्रौढत्वाने ग्रासले,
तेव्हा तुझीच साथ ह्या कु़डीत
प्राण फुंकत होती,
अंधारातल्या घोर चकव्याला
नवे आव्हान देत होती,

परिस्थितीच्या वादळात दोघेही
पुरते होतो वाट चुकलेले,
तुझ्या केवळ अस्तित्वानेच नवचैतन्य
मिळाले लढण्याचे, मुळातच नसलेले
अचानक तू सोडून गेलीस,
जगायचे कसे हेच मग मी
विसरून गेलो,

अशा या एकांड्या रस्त्याने
अडखळत पाऊल टाकताना,
माझीच सावली मला भिववते आहे,
तुझ्या त्या अवचित जाण्याची
गूढ महती मला पटवते आहे!!!

- आनंदीनंदन

(३ नोव्हेंबर १९९३, बुधवार, रात्री ९.४० वा., पुणे)
----

६. राजकारणी
--------------

राजकारणात तसे ते हुशार होते,
सत्तेचे अनेक पत्ते यशस्वीपणे
त्यांनी मांडले होते,

हुकमाचे एक्के नेहमीच त्यांच्या हाती असत,
अक्कलहुशारीमुळे समोरच्याच्या मनावरही ते लगेच ठसत!

सरकारे उलथवणे डाव्या हाताचा मळ होता,
पंतप्रधानपदासाठी कायमच टाकलेला गळ होता,

कधी डावे, कधी उजवे सारेच त्यांचे मित्र होते,
कधी संत, कधी चोर, सगळेच चित्र स्वच्छ होते,

दिवसाउजेडी गरीब, असहाय्य जनतेची
त्यांच्या दारी रांग असे,
दिवस सरताच, निशेच्या संगतीने,
वारुणिच्या रंगतीने सभा त्यांची रंगत असे

खाकी अर्धी चड्डीवाल्यांवरही त्यांचा जीव होता,
हिरव्या निशाणावरही त्यांचा तेवढाच जीव होता,
खरा जीव त्यांचा होता काळ्या गॉगलवाल्यांवर,
कारण ते होते तेच त्यांच्यामुळे; अन्यथा केव्हाच वर,

राजकारण ही त्यांची हौस होती,
फावल्या वेळेची करमणूक होती,
खरी लालसा तिजोरी भरण्याची होती,
त्यासाठीच त्यांच्या देहाची धडपड होती,

कॉन्टेसा, मारुती, अम्बेसिडर सगळ्या वापरून
जुन्या झाल्या होत्या,
मर्सिडीज, टोयोटा, रोल्स रॉइस यांच्या
ऑर्डरी बुक केल्या होत्या,

सामान्यांच्या झोपडपट्टीत पायी ते फिरत होते,
पायांना घाण लागू नये म्हणून,
'दाऊद'चे बूट सजग होते,

त्यांची देहयष्टी पहिल्यापासूनच स्थूल असणार,
भरपूर लागतं 'खायला', कोण काय करणार?
इवल्याशा त्या पोटासाठीच तर सारी धडपड आहे,
जीवाच्या कराराने जगणाऱ्यांची केविलवाणी ती तडफड आहे!!!

- आनंदीनंदन

(३ नोव्हेंबर १९९३, बुधवार, रात्री ९.५५ वा., पुणे)
----

७. आम्ही
----------

चुकणं माहीतच नाही आम्हाला,
आम्ही म्हणजे विश्वाचे सारथी,
सर्व जगाच्या बुद्धीचे भांडार,
बृहस्पतीचेही बाप आम्ही,
चुकणं माहीतच नाही आम्हाला,
आम्ही जन्माला आलो तेच मुळी
जगाच्या चुका सुधारायला,
सर्व काही ठाकठीक होण्यासाठी,
करड्या नजरेचा अंकुश फिरवायला,
भलेही करू आम्ही दशसहस्र अपराध,
पण, चुकणं माहीतच नाही आम्हाला,
जननियंत्याने करून ठेवलेत प्रचंड घोटाळे,
तेच निस्तरण्याचे आमचे काम मोठे,
अनेक कचराकुंड्या कराव्या लागतात साफ,
ह्या बाबतीतही आम्ही आहोत आळश्यांचे बाप,
पण शेवटी कामं करणारे अर्थात् आम्हीच,
कारण, चुकणं माहीतच नाही आम्हाला!!!

(१९ ऑक्टोबर १९९३, पुणे)
----

८. दोष कुणाचा?
----------------

चंदेरी रातीचा गोडवा मोठा,
अलगद अलगद गाणे येई ओठा,
जरी बसले सभोवती सगळे,
का मज होते असे ते न कळे,
प्रतिमा फक्त तुझीच पाहती डोळे,
अन्य साऱ्यांचे भानच जणू गळे,
क्षणी भिडती नयनांना नयन आपुले,
उरी घायाळ करीसी; आम्ही बापुडे
धडधड माझी वाढता वाढे उरीची,
का पडतोस फंदी या; काळजी मनीची,
तुझे ते शरसंधान साहवेना मज जरी,
मनी उमटते चित्र प्रणयी भरजरी,
तशातच तुझे ते उठणे अवचित,
अन् येणे माझ्याकडे; मी भयचकित,
स्पर्शाची कल्पना तुझ्या, मला उभारी देई,
आणि अचानक; तू मजसमोरून निघूनी जातसे,
डोक्यात प्रकाश पडे मग; अरे, हिच्या डोळ्यांत दोष असे!!!

- आनंदीनंदन

(१९ ऑक्टोबर १९९३, पुणे)
---

काही कविता...

सोळा-अठराच्या वयात तशा बहुतेकांना कविता होतातच.
मलाही झाल्या.
त्यातल्याच या काही... बीस साल बाद...
(टोपणनावानं लिहिण्याची सवय तेव्हापासून... तेव्हाचं अस्मादिक कवींचं होतं आनंदीनंदन..)
---
काही कविता...
-------------

१. ध्येय
---------
मंतरलेले ते दिवस गेले,
आठवणींचे फक्त निर्माल्य उरले,
जीवनातील गेला आनंद सगळा,
आता फक्त मोजणे घटका नि पळा,
आत्मविश्वासाचा हरवला वारू,
जीवनाचे हे भरकटले तारू,
जीवनपथावर लोकांची रहदारी भारी,
आपल्याबरोबर आपली सावली तेवढीच खरी,
बावरून गेलोय मी पुरता इथे,
साथीदारही न उरती संगतीला जिथे,
आता फक्त चालणे एकट्याचे आहे,
सामर्थ्य समोरचा अंधार पेलण्याचे आहे,
त्यासाठी धाडस हवे आहे आता फक्त,
त्यासाठी हवे आहे उसळते गरम रक्त,
तारुण्यातच गरम रक्ताचे उसळणे
पुरते थंडावले आहे,
जीवनातील अनपेक्षित वादळांशी
झेप-झुंजा घेऊन ते थकले आहे,
पुन्हा करायची आहे नवी सुरुवात,
जिद्द आहे परिस्थितीवर करण्याची मात,
त्यासाठी पुरता नाहीये तुझ्या आठवणींचा निवारा,
तर मग प्रत्यक्षच हवीय तुझ्या
सोबतीची जलधारा,
येशील का माझ्याबरोबर हातात हात घेऊन,
समोरच्या दूर डोंगरावरील शिखर
खुणावतेय अजून,
बरोबर! तिथंच तर मला जायचं आहे,
तुझ्याबरोबरच माझ्या ध्येयावरही प्रेम करायचं आहे!!!

- आनंदीनंदन

(१ नोव्हेंबर १९९३, सोमवार, रात्री ११.१५ वा., पुणे)
---

२. शब्दप्रेम
-----------

अर्थहीन शब्दांचे गाढवओझे घेऊन
का आम्ही करतो आहोत प्रवास आमच्या ध्येयाचा,
शब्दांच्या, महाशब्दांच्या थोर कुबड्या
घेऊन मिळणार आहे का आम्हाला
आमचं ध्येय?
शब्दांत खूप सामर्थ्य आहे... माहीत आहे
'शब्द हाचि देव...' तुकोबाच म्हणून गेले आहेत,
पण शब्दांच्या जंजाळात आपले
पाय अडकवून कायमची आपली वाटचाल
नाही का थांबवत आपण?
आम्ही सारे असेच,
शब्दांचे इमले बांधू, शब्दसागरात पोहू,
शब्दांच्या साम्राज्याचे सम्राट बनू,
पण करणार नाही प्रत्यक्ष कृती काहीच!
'शब्द' हे 'कृती'चे सर्वांत मोठे शत्रू आहेत का?
'शब्द' हे मायावी राक्षसच आहेत जणू!
'कृती'च्या राजकुमारीला त्यांनी बंदिस्त
करून टाकलं आहे आपल्या मोहजालात,
आम्ही तरी कसले करंटे!
आम्हाला राजकुमारीची सुटका नकोच आहे,
त्यासाठी हवं तर आम्ही मायावी राक्षसांचे
पाय चेपू, गुणगान गाऊ,
पण इच्छा हीच, त्यांनी राजकुमारीला सोडू नये,
तिकडं इंग्लंड-अमेरिकेत राजकुमारीचं राज्य चालू आहे,
आम्ही मात्र मायावी राक्षसांचेच आयुष्यभराचे दास,
का आम्ही आहोत याबाबतीत इतके उदास?

- आनंदीनंदन

(१ नोव्हेंबर १९९३, सोमवार, रात्री ११.२५ वा., पुणे)
----

३. मन
-------
मन मोठी विचित्र गोष्ट आहे,
म्हटला तर आरसा आहे,
म्हटलं तर हवी ती गोष्ट लपवायची
चांगली गुप्त पेटी आहे,
जेव्हा आपण क्वचित कधी तरी
एखादी चांगली गोष्ट करतो,
मनाचा आरसा लगेच चारचौघांत
तेच ते सांगण्यासाठी 'रिफ्लेक्ट' होतो,
जेव्हा म्हणजे बऱ्याचदा आपण
अशा गोष्टी करतो,
की तेव्हा ह्या आरशाने न चमकणेच
चांगले असते,
आटोकाट प्रयत्न करतो आपण,
आपले दोन्ही तळवे आरशावर
झाकून तो पुरता झाकेल याची
काळजी घेत,
पण काही आगाऊ प्रकाशकिरण
निसटतातच त्यातून,
आणि धडकतात समोरच्याच्या आरशावर,
तो विचारतो, 'काय रे, अस्वस्थ
दिसतोयस? काय झालं?'
काय सांगणार कप्पाळ?
प्रकाशकिरण सगळे, ऐकत नाहीत आपलं,
तेव्हा वाटतं,
आरसा नसावंच मन,
असावी ती छानशी, लोखंडाची गुप्त पेटी,
की ज्यात आपण
अशा गोष्टी टाकतो, की ज्या
आयुष्यभर विसरणं आपल्याला
मुळीच नसतं शक्य!!

- आनंदीनंदन
(१ नोव्हेंबर १९९३, सोमवार, रात्री ११.३० वा., पुणे
----

22 Nov 2013

झाकलं माणिक...



मी जामखेडचा. नगर हे माझ्या जिल्ह्याचं प्रमुख ठिकाण. मी ते प्रथम पाहिलं, ते वयाच्या सहाव्या वर्षी बहुधा. 'बालशिवाजी' हा सिनेमा नगरमध्ये अप्सरा टॉकीजमध्ये (आताचं शिवम प्लाझा) लागला होता आणि तो पाहायला आम्ही काकासमवेत नगरमध्ये आलो होतो. त्यानंतर वयाच्या बारा-तेराव्या वर्षी नगरमध्ये राहायलाच आलो. त्यानंतर सलग जरी नाही, तरी सुमारे दहा-पंधरा वर्षं नगरमध्ये राहण्याचा योग आला. माझ्या आयुष्यात त्यामुळं नगर आणि तिथल्या माझ्या रहिवासाचं स्थान अविभाज्य आहे. नगरच्या आठवणी कायम मनात दाटतात. आता असं वाटतं, की हे काहीसं दुर्दैवी गाव. नैसर्गिकरीत्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात येणारं आणि सामाजिक-सांस्कृतिक अन् राजकीयदृष्ट्या पुण्याच्या छायेत येणारं. भव्य ऐतिहासिक वारसा असला, तरी भविष्याकडं जाण्यासाठी वर्तमानानं जे बोट धरावं लागतं, ते कधीच सोडून दिलेलं. एखाद्या बड्या राजघराण्यात पाच-दहा कर्तबगार मुलं असतात अन् त्यातलं एखादं सगळ्याच बाबतीत कमी असतं, तसं हे पश्चिम महाराष्ट्रातलं उणावलेलं ठाणं! खरं तर नगर खूप चांगलं, प्रगत शहर व्हायला काही हरकत नव्हती. किंबहुना ऐंशीच्या दशकात हे तसं बऱ्यापैकी टुमदार शहर होतं. तिथल्या रेल्वे स्टेशनसारखंच. पण पुढं काही तरी जबरदस्त बिनसत गेलं. नवनीतभाई बार्शीकरांसारखं या शहरावर प्रेम करणारं नेतृत्व पुन्हा झालं नाही. त्यामुळंच नाशिक व औरंगाबाद ही शहरं 'प्रगती फास्ट' करीत पुढं निघून गेली आणि नगर हे पुण्याचं (पण सावत्रच) उपनगर बनून राहिलं... पण मला तरी नगर म्हणजे कायम एक झाकलं माणिक वाटत आलेलं आहे...
...माणिक चौक हा नगरमधला एक प्रमुख चौक. माळीवाडा वेशीकडून नगरच्या सुप्रसिद्ध कापडबाजाराकडं जाताना लागतो. तिथं सेनापती बापटांचा पुतळा असून, त्याला एका सुंदर कारंज्याद्वारे संध्याकाळी साग्रसंगीत, संपूर्ण रंगीत अशी आंघोळ घातली जात असे. मी काही वर्षांपूर्वी नगरमध्ये राहत होतो, तेव्हा हे सुंदर दृश्य पाहून कायम तिथं थबकायचो. (आता काय परिस्थिती आहे, माहिती नाही.) चितळे रोड हा नगरमधला महत्त्वाचा रोड. चौपाटी कारंजापासून सुरू होऊन तेलीखुंटापाशी पुन्हा थेट त्या सुप्रसिद्ध कापडबाजाराला जाऊन मिळणारा. या चौपाटी कारंजापाशी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अर्धपुतळा आहे. या पुतळ्याभोवतीही एक कारंजं असायचं आणि संध्याकाळी ते छान थुईथुई उडत सावरकरांना सचैल स्नान घडवायचं. मी संध्याकाळी चितळे रोडवर टाइमपास करून घराकडं जाताना या पुतळ्यासमोर थबकायचो. ते कारंजं पाहून मस्त, गार वाटायचं. लालटाकी रोड आणि ती लालटाकी हे नगरमधलं तेव्हाचं तरुणांचं आवडतं 'डेस्टिनेशन' होतं. या लालटाकीवर नेहरूंचा पूर्णाकृती पुतळा आहे. त्याच्या पायाशी अर्धगोलाकार, रंगीत दिव्यांच्या झोतात पाणी सोडलं जायचं... संध्याकाळी फिरायला जायचं हे खास ठिकाण होतं... शिवाय सिद्धीबाग, वाडिया पार्क ही ठिकाणं होतीच. सावेडी विकसित होत होतं... पूर्वी झोपडी कँटीन गावाबाहेर वाटायचं, ते हळूहळू मध्यवस्तीत आलं. प्रोफेसर कॉलनी, गुलमोहोर रोड, आकाशवाणी हा सगळा भाग एकदम झक्कास झाला.


थोडक्यात सांगायचं, तर नव्वदच्या दशकातलं नगर हे तसं टुमदार, आटोपशीर व निवांत, मस्त शहर होतं. गुजर गल्ली किंवा सातभाई गल्लीत वाड्यात भाड्यानं किंवा स्वतःचा छोटा फ्लॅट घेऊन राहावं, नवीन मराठी शाळेत किंवा भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये किंवा कुलकर्णी सरांच्या समर्थ विद्या मंदिरात शिकावं, वाडिया पार्क किंवा गांधी मैदानात क्रिकेट खेळायला किंवा एरवी बड्या नेत्यांच्या सभा ऐकायला जावं, चितळे रोडवर भाजी घ्यावी, सारडा किंवा 'कोहिनूर'मधून कपडे घ्यावेत, 'वाय. प्रकाश' (म्हणजे प्रकाश येनगंदूल) किंवा 'डी. चंद्रकांत'कडून शिवून घ्यावेत, 'रामप्रसाद'चा चिवडा खावा, आशा टॉकीजला (आणि नंतर महेश) मॅटिनीचा शो बघावा, मोने कला मंदिरात (आणि नंतर सहकार सभागृहात) नाटकं पाहावीत, संध्याकाळी लालटाकी किंवा गुलमोहोर रोडला फिरायला जावं, १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला भुईकोट किल्ला हिंडून यावा, पावसाळ्यात सायकली काढून चांदबीबीचा महाल किंवा डोंगरगण गाठावं, आठवड्यातून एकदा तरी नगर-पुणे नॉनस्टॉप एसटीनं पुण्याला जावं (काही तरी काम असतंच असतं...), चतुर्थीला माळीवाड्याच्या विशाल गणपतीला किंवा दिल्लीगेटच्या शमी गणपतीला जावं, दर शनिवारी दिल्लीगेटच्या बाहेरच्या शनी मंदिरात जावं, नगर कॉलेजच्या ग्राउंडवर चाललेले सामने पाहावेत, कधी लष्कराच्या परिसरात हिंडून रणगाडे बघावेत, संक्रांतीला पचंब्याची जत्रा गाठावी... असं सगळं तेव्हाचं नगरी आयुष्य होतं. खूप स्वस्ताईही होती. गरजा फार थोड्या होत्या. आता ते खरोखर तसं राहिलं आहे का, मला शंका आहे.

गाव लहान असल्यामुळं बहुतेक सगळे जण एकमेकांना ओळखत. पुण्यात जसा पेठांचा भाग, तसं खरं नगर माळीवाडा ते दिल्लीगेट या दोन वेशींतच नांदत होतं. पूर्वी माळीवाड्याचं एकच स्टँड होतं. आता तीन तीन स्टँड झाले. माळीवाड्याच्या स्टँडच्या बाहेर प्रसिद्ध नगरी तांगे उभे असत. हे तांगे होते, तोपर्यंत बारकुडे रस्ते, गल्ल्या आणि बोळांतून वाडा संस्कृती टिकून होती. मिश्र वस्ती होती, त्यामुळं बहुतांश वेळा एकोप्यानं, गुण्या-गोविंदानं नांदण्याकडं कल असायचा. वर्ष-दोन वर्षांत दंगे-धोपे व्हायचेच. पण दोन्हीकडच्या भडक डोक्याच्या लोकांवर थंडगार पाणी ओतणारे बुजुर्गही दोन्ही बाजूंना उपस्थित असायचे. त्यामुळं ताणेबाणे असले, तरी विखारी नव्हते. शिवाय वस्ती एवढी एकमेकांना लागून आणि व्यवहाराला रोजचा संबंध... त्यामुळं गावात शांतता असे. पण ही शांतता कधी कधी अंगावर येई. कारण नगरी लोक एवढे सहनशील, की चार-चार दिवस पाणी आलं नाही, तरी हूं की चूं करणार नाहीत. आहे त्या पाण्यात भागवतील. त्या चितळे रोडवर नेहरू मार्केटसमोर रोज ट्रॅफिक जॅम व्हायचं. त्यातच गाई-गुरं, एवढंच काय म्हशींचे तांडे त्या रस्त्यावर फतकल मारून बसायचे. पण अस्सल नगरकर त्यांना वळसा घालून आपली लूना पुढं काढत आणि जाताना त्या गोमातेला हात लावून दर्शनही घेत. रस्त्यांची अवस्था भयानक, पण नगरचा माणूस शांतपणे त्यातून पुढे जाईल... नगर एरवी दुष्काळी असलं, तरी पावसाळ्यात कधी कधी जोरदार एक-दोन पाऊस पडतातच. अशा वेळी दिल्लीगेट ते न्यू आर्टस या रस्त्याचं अक्षरशः तळं होई. पण त्याविषयी ना खेद ना खंत. तेव्हा उन्हाळ्यात दिवसेंदिवस लाइट नसायचे... प्रचंड उकडायचं. पण नगरकर रागवायचे नाहीत. शांतपणे अंगणात खुर्ची टाकून डास वारीत बसायचे. ऐन सणाच्या दिवशी पाणी तोडायचं हा तर पालिकेचा खाक्याच होता. पण तेव्हाही कुठं मोर्चा निघाला नाही की निषेधाचं पत्र कुणी लिहिलं नाही. नगरमधल्या या टोकाच्या सहनशीलतेचा प्रचंड राग यायचा. पण नगरी वातावरणात तो मनातच नष्ट व्हायचा. कधी दगड उचलून मारावासा वाटला नाही.
खरं तर हे झाकलं माणिक सांस्कृतिकदृष्ट्याही किती समृद्ध होतं! नगरचं जिल्हा वाचनालय पावणेदोनशे वर्षांपूर्वी स्थापन झालं आहे. पुण्यातदेखील एवढं जुनं ग्रंथालय नाही. मामा (उर्फ मधुकर) तोरडमल, बंडू (उर्फ सदाशिव) अमरापूरकर यांच्यापासून ते मिलिंद शिंदे (उर्फ तांबडेबाबा) व्हाया अनिल क्षीरसागर, मोहन सैद असा इथल्या नाट्य क्षेत्राचा गाजावाजा आहे. नगरमध्ये अनेक नाटकं आणणारे चार्मिंग पेन सेंटरचे सतीश अडगटला यांना कोण विसरेल? रामदास फुटाण्यांपासून ते बाबासाहेब सौदागरपर्यंत अनेक कवी आणि सदानंद भणगेंपासून ते संजय कळमकरांपर्यंत अनेक लेखक अनेक वर्षांपासून नाव राखून आहेत. गंगाधर मोरजे, सुरेश जोशी यांच्यासारखे समर्पित संशोधक नगरमध्ये होऊन गेले. त्यांचं योगदान केवळ अतुलनीय आहे. विलास गिते, प्रा. लछमन हर्दवाणी अनेक वर्षे व्रतस्थपणे आपले अनुवादाचे कार्य करीत आहेत. सु. प्र. कुलकर्णी, लीला गोविलकर, मेधा काळे, अनिल सहस्रबुद्धे, मकरंद खेर यांच्यासारखे प्राध्यापक-लेखक मंडळीही उत्साहाने नगरचं सांस्कृतिक विश्व जागतं ठेवीत आले आहेत. श्रीधर अंभोरे, अनुराधा ठाकूर यांच्यासारख्या चित्रकारांनी राज्यभर नाव गाजवलं, तर शिल्पकार प्रमोद कांबळे यांचं नाव घेतल्याशिवाय नगरचा कलावारसा अपूर्ण राहील, याची खात्री आहे. नगरमध्ये गणपतीच्या मूर्ती तयार होतात आणि त्या राज्यभर जातात.  महापालिकेच्या महावीर कलादालनात वर्षभर कसली कसली प्रदर्शनं सुरू असतात. पूर्वीच्या नगरपालिकेचं पहिल्या मजल्यावरचं सुंदर सभागृह तर अनेक सांस्कृतिक-साहित्यिक सोहळ्यांचं साक्षीदार होतं. अलीकडंच ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचं समजल्यावर आपल्या शरीराचाच कुठला तरी हिस्सा नाहीसा झाल्यासारखं मला दुःख झालं होतं.
शैक्षणिकदृष्ट्याही नगरला चांगली परंपरा होती. नगर कॉलेज हे सर्वांत जुनं कॉलेज. शिवाय हिंद सेवा मंडळाचं पेमराज सारडा कॉलेज आणि जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचं न्यू आर्ट्-स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ही आणखी दोन महत्त्वाची कॉलेजेस. शिवाय गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय आणि विखे पाटलांचं विळद घाटात बांधलेलं इंजिनिअरिंग कॉलेज. या पंचकोनात नगरचं कॉलेजविश्व फिरायचं. पुणे विद्यापीठाला जोडलेलं असल्यानं दर्जा आणि प्रतिष्ठा लाभलेली. संपूर्ण जिल्ह्यातून आणि अगदी शेजारच्या मराठवाड्यातूनही मुलं नगरला शिकायला येतात. राजकीयदृष्ट्या नगर हे अत्यंत जागरूक गाव असल्यानं त्या राजकीय वारशाची लस महाविद्यालयीन जीवनातच टोचली जायची. भालचंद्र नेमाडेंच्या बऱ्याचशा कादंबऱ्यांतून नगरच्या तत्कालीन शैक्षणिक विश्वाचं चित्रण आल्याचं जाणकार सांगतात.
नगरमधील खाद्ययात्रेविषयी सहज आठवत गेलो आणि वाटलं, की नगरचं खाद्यजीवनही किती चवदार होतं... जुन्या एसटी स्टँडवरची बाबासाहेबची पुणेरी भेळ आणि त्या मालकांचं ते शास्त्रीय संगीताचं वेड नगरकरांना चांगलंच माहिती आहे. मार्केट यार्डच्या बाहेरही एक गाडी असायची. तिथं तीन रुपयांना भरपेट अन् चविष्ट फरसाण भेळ मिळायची. नगरमध्ये फरसाणला कडबा म्हणतात. तर हा कडबा आणि चुरमुरे घालून केलेला भेळभत्ता म्हणजे अनेकांचं टाइमपास खाणं... माणिक चौकातला वडापाव खूपच फेमस. संध्याकाळी तिथं प्रचंड गर्दी व्हायची. हा वडा एवढा मोठा असायचा, की तो देतानाच दोन पाव द्यायचा.

हा जंबो वडा-पाव खाल्ला, की कधी कधी एका जेवणाचं काम भागायचं. या वडापावनंतर दुर्गासिंग आणि द्वारकासिंगची लस्सी प्यायची. एक दुकान तिथं जवळच होतं, तर दुसरं चितळे रोडवर. चितळे रोडवरच नेता सुभाष चौकात खन्नूशेठ पंड्यांचं रुचिरा स्वीट्स आहे. लोक सकाळी नाष्ट्याला गरम जिलेबी घेऊन खातात, हे दृश्य माझ्या आयुष्यात सर्वप्रथम पाहिलं ते इथंच. खरोखर या जिलेबीसारखी खमंग, कुरकुरीत जिलेबी मी अन्यत्र कुठं अजून तरी खाल्लेली नाही. याच चौकात नगरचा प्रसिद्ध खवा मिळायचा, ते काका हलवाईंचं दुकान होतं. कापडबाजारात स्वीट होम हे आइस्क्रीमचं दुकान आणि तिथलं मँगो आइस्क्रीम हा कापडबाजारातल्या खरेदीनंतरचा हमखास कार्यक्रम असायचा. कोहिनूरच्या खालीच असलेला महेंद्र पेडावाला आणि त्यांचे ते जंबो साइझ पेढे परीक्षांमधलं आमचं यश खरोखर वर्धिष्णू आणि गोड करायचे. महेंद्र पेडावालांकडं मिळणाऱ्या विविध चवींच्या शेव हेही एक आकर्षण असायचं. सिद्धीबागेसमोर असलेल्या 'रॉयल' या फेमस दुकानातलं आइस्क्रीम आणि पिस्ता कुल्फी खाल्ली नाही, असा नगरकर माणूस नसेल! अर्बन बँक रोडवर रसना नावाचं मिसळीचं दुकान होतं. तिथली जहाल, तिखट मिसळ खाऊन डोळ्यांतून पाणी वाहिल्याच्या आठवणी आहेत. सारडा कॉलेजच्या कँटीनची मिसळही फेमस होती म्हणे. पण ती खाण्याचा अस्मादिकांना कधी योग आला नाही. मार्केट यार्डच्या दारात एक आवळ्याचे सर्व पदार्थ मिळणारं दुकान होतं. तिथं आवळ्याचा चहा मिळायचा. असा चहा अन्यत्र कुठंही आजतागायत मिळालेला नाही. तिथंच समोर सुखसागर नावाचं हॉटेल होतं. त्या हॉटेलात प्रथम सीताफळाच्या चवीचं आइस्क्रीम खाल्ल्याचं आठवतंय. नगरच्या पंचक्रोशीत विशेषतः पांजरपोळ संस्थेत भरणाऱ्या हुरडा पार्ट्या याही नगरच्या खाद्यजीवनाच्या अविभाज्य भाग आहेत.
नगरचे दिवस आठवले, की हे सगळं आठवतं. मग पुनःपुन्हा वाटत राहतं, की राजकीय-सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या एवढं पुढारलेलं असूनही नगर मागं का पडलं? हे झाकलं माणिक झाकलेलंच का राहिलं? त्याची किंमत कुणाला का कळली नाही? आशियातलं सर्वांत मोठं खेडं अशी कुचेष्टा नगरचेच लोक करतात. वर चांदबीबी आज जरी नगरमध्ये आली, तरी गल्ली-बोळ चुकणार नाही, असा विनोद करतात. हे प्रतिमाभंजन कशामुळं? ही आत्मपीडा कशामुळं? राजकीय नेतृत्वाची पोकळी आणि स्थानिक लोकमताच्या दबावाचा अभाव या दुहेरी कात्रीत नगरची ही दशा झाली का? माहिती नाही. पण उत्तरं शोधायला हवीत.
नगरमधली पुढची पिढी कदाचित अशी नसेल... त्यांच्यामध्ये काही वेगळ्या ऊर्मी जागत असतील... तसं असेल तर हे 'माणिक'' झळाळून उठायला वेळ लागणार नाही!

9 Nov 2013

सुवर्णभूमीत... ५


परत मायभूमीकडे...
-----------------------

सकाळी साडेसातला उठलो. कालची ती थरारक पावसाळी रात्र आणि त्या दोन बायकांसोबत अनोळखी टॅक्सीवाल्यासोबत केलेला तो प्रवास आठवला आणि स्वतःचंच हसू आलं. साडेआठपर्यंत आवरून तयार झालो. तेवढ्यात लक्ष्मीचा फोन आला, की ब्रेकफास्टला येतोयस का म्हणून. मग पावणेनऊला खाली लॉबीत गेलो. त्यांच्याबरोबर ज्यूस आणि फळं हा नेहमीचा ब्रेकफास्ट घेतला. नंतर तिथल्या वेट्रेसनं खास थाई चहा आम्हाला सर्व्ह केला. तो घेतला आणि पुन्हा वर रूमवर आलो. बँकॉक पोस्ट टाकला होता. तो चाळला. त्यात युवराजसिंगनं टी-२० वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूंवर सहा षटकार मारल्याची बातमी ठळक आली होती. त्या संपूर्ण पेपरमध्ये भारताशी संबंधित अशी ती एकच बातमी होती. त्या पेपरची किंमतही होती २५ बाथ. अर्थात हॉटेलमध्ये मला तो फुकटच मिळाला होता. पण एकूण थायलंडमध्ये इंग्रजी वृत्तपत्र ही काही परवडण्याजोगी बाब आहे, असं वाटलं नाही. त्या मानानं आपल्याकडं पेपरच्या किमती फारच स्वस्त आहेत.
दहा वाजता शॉपिंगसाठी लॉबीत जमायचं असं आमचं ठरलं होतं. त्यानुसार मधुरा आणि मी पुन्हा लोटस आणि सेंट्रल या दोन मॉलमध्ये जाऊन उरलीसुरली खरेदी केली. बरोबर तीन वाजता पिंकी आम्हाला न्यायला गाडी घेऊन आली. खाली लॉबीत आम्ही चौघांनी फोटो काढून घेतले. मग गाडीतून त्याच त्या नाइन रामा रोडवरून सुवर्णभूमी विमानतळाकडं निघालो



पाऊण तासात एअरपोर्टवर पोचलो. तिथं लगेज चेक-इन, इमिग्रेशन आदी सोपस्कार पार पडल्यावर आम्ही थाई एअरवेजच्या लाउंजमध्ये जाऊन बसलो. पावणेसहा वाजता मी तिथून बायकोला मेल पाठविली आणि निघत असल्याचं कळवलं. बरोबर सहा वाजता आम्ही डी-६ नंबरच्या गेटला गेलो. तेथील सोपस्कार आटोपून मुंबईच्या विमानात बसलो. आमच्या विनंतीनुसार मार्सेलिसला बिझनेस क्लासमध्ये अपग्रेडेशन मिळालं. एकच सीट शिल्लक होती. त्यामुळं आम्ही तिघं इकॉनॉमी क्लासमध्ये बसलो. बरोबर पावणेसातला आम्ही त्या सुवर्णभूमीला टाटा करून टेकऑफ केलं. विमानात व्हेज जेवण मिळालं. कुठला तरी फालतू हिंदी सिनेमा पाहत वेळ घालविला. येताना विमान बंगालच्या उपसागरावरून उडत होतं व काही काळ जरा एअर टर्ब्युलन्स जाणवला. पहिल्यांदाच थोडी भीती वाटली. आपल्या खाली प्रचंड पाण्याचा साठा पसरलेला आहे आणि आपल्याला पोहता येत नाही, या दोन गोष्टी एकदमच मनात आल्या. सहज मी खिडकीतून बाहेर पाहिलं. माझ्या डाव्या बाजूला विमानाचा लांबलचक पंख पसरला होता. आमचं विमान ढगांच्या वरून उडत होतं. त्यामुळं खालचं काही दिसत नव्हतं. उलट चंद्र उगवला होता. ढगांच्या वरून मी पहिल्यांदाच असा चंद्र पाहत होतो. चंद्राचा पांढुरका प्रकाश खालच्या ढगांवर पडला होता आणि एका रूपेरी महासागरातून आपलं विमान नावाचं जहाज हळुवारपणं चाललं आहे, असं काही तरी मला वाटू लागलं. अचानक त्या पंखावर साक्षात पवनपुत्र हनुमान बसले आहेत, असं मला चक्क दिसलं. एक गुडघा टेकवून ते त्या पंखावर बसले आहेत आणि माझ्याकडं बघून हसताहेत, असंही मला दिसलं. आता हा निखालस भास होता, यात वाद नाही. (मी इकॉनॉमी क्लासमध्ये बसलो होतो, त्यामुळं मद्य मिळाल्याची व मी ते घेतल्याचीही शक्यता शून्य होती.) पण असं ते दृश्य अचानक माझ्या डोळ्यांसमोर का आलं, याचा उलगडा मला आजतागाजत झालेला नाही. वास्तविक मी खूप देव देव करणारा नव्हे. मारुतीचा भक्त, शनिवारचा उपवास करणारा असा तर मुळीच नव्हे. तरीही मला वाटतं, त्या भीतीच्या क्षणी माझ्या अबोध मनात कुठं तरी खोल दडून बसलेलं मारुती स्तोत्र उफाळून वर आलं असणार आणि त्या मारुती स्तोत्राच्या पुस्तकावर असतो, तसाच तो मारुतीराया तिथं बसलेला दिसला असणार. पण एकूणच त्या प्रसंगानंतर माझी भीती पूर्ण नष्ट झाली. तो एअर टर्ब्युलन्सही आता गेला होता. विमानात सर्वांत जवळचा विमानतळ कुठला, हे समोरच्या स्क्रीनवर येत होतं. आधी पोर्ट ब्लेअर आलं. नंतर हैदराबाद आलं. नंतर तर वेरूळ-अजिंठा, नाशिक हेही नकाशात दिसू लागलं. मग खाली एक झगझगीत शहर दिसलं. ते बहुधा नाशिकच असावं. थोड्याच वेळात विमानाचं डिसेंडिंग सुरू झालं. ठाणं ओलांडलं. खाडीही ओलांडली, पण मुंबईच्या विमानतळावर भरपूर ट्रॅफिक जॅम होतं, म्हणे. मग आमचं विमान आकाशात गोल गोल फेऱ्या मारीत राहिलं. लांब अरबी समुद्रात जाऊन पुन्हा ठाण्यावरून, खाडीवरून एक चक्कर झाली. अखेर खाली ग्रीन सिग्नल मिळाला आणि विमान वेगानं वांद्र्याच्या झगमगाटावरून विमानतळावर उतरलं. जाताना भव्य वाटलेलं आपलं मुंबईचं विमानतळ आता फारच छोटं आणि साधं वाटलं. इमिग्रेशनचे सोपस्कार पार पाडून ग्रीन चॅनेलमधून बाहेर आलो. मला आठवतंय, आता साठीपार गेलेला डॉलर तेव्हा फक्त ३९ रुपयांना होता. कारण समोरच एसबीआयचं करन्सी एक्स्चेंज काउंटरवर हे दर लिहिलेले मला अजून लक्षात आहेत. बाहेर आल्यावर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. कार्डांची देवाणघेवाण झाली. विमानतळाच्या बाहेर पडल्यावर मी प्री-पेड टॅक्सी केली आणि दादरला निघालो. मुंबईत हलका पाऊस सुरू होता. गणपतीचे दिवस होते. काही ठिकाणी सात दिवसांच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. रात्री साडेदहा-अकराचा सुमार होता. पण माहीममध्ये ट्रॅफिक तुंबलं होतं. बँकॉकच्या रस्त्यांची आणि मुंबईची सारखी तुलना सुरू झाली. तरीही मुंबईचा डौल, शान, ऐट काही औरच आहे, असंच वाटलं. दादरला अकराची शिवनेरी व्होल्वो मिळाली. अडीचला शिवाजीनगरला आलो. माझे वडील मला न्यायला तिथं आले होते. पहाटे तीनला घरी पोचलो. अशा रीतीनं माझा पहिला परदेश दौरा सुफळ संपूर्ण झाला...


तेव्हा माझ्याकडं डिजिटल कॅमेरा नव्हता. तेव्हा रोल टाकून मी माझ्या कोडॅक क्रोमावर तिथले फोटो काढले. अर्थात ते सगळे चांगलेच आले. पण मोबाइलही कॅमेरावाले नव्हते. सहाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, पण आपण फार काही तरी जुनी गोष्ट सांगतो आहोत, असं वाटतंय, एवढं हल्ली सगळं फार वेगानं बदलतंय. अर्थात जग कितीही बदललं, आपण कितीही बदललो, तरी आयुष्यात पहिलेपणाच्या ज्या काही गोष्टी असतात, त्या कधीच विसरल्या जात नाहीत. माझा हा पहिला परदेश दौरा असल्यानं मीही तो कधी विसरणं शक्य नाही. आयुष्याकडं बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मला या ट्रिपमुळं मिळाला. थायलंडविषयीचे अनेक गैरसमज दूर झाले. या ट्रिपविषयी लिहावं, असं तेव्हा लगेच मला का वाटलं नाही, हे मला आता लक्षात येत नाही. पण सुदैवानं मी त्या पाच दिवसांची डायरी लिहिली आहे. आता इतक्या वर्षांनंतर या ट्रिपविषयी लिहावंसं वाटलं, तेव्हा त्या डायरीचा नक्कीच खूप उपयोग झाला. मधुरा आणि लक्ष्मी यांच्याशी काही काळ ई-मेलवरून संपर्कात होतो. नंतर तोही संपर्क हळूहळू कमी होत गेला. आता तर तो नाहीच. त्या दोघीही कुठं असतात, काय करतात मला ठाऊक नाही. यथा काष्ठं च काष्ठं च... म्हणतात, तसंच हे. या छोट्याशा ट्रिपमध्ये ग्रेट काही घडलं नसेल, पण तरीही माझ्यासाठी ती स्पेशल आहे, कारण शेवटी ती माझी पहिलीवहिली परदेशाची सहल आहे...


---
(समाप्त)
-----