28 Feb 2021

दृष्टी-श्रुती डिजिटल दिवाळी अंक लेख २०२०

नवी दृष्टी देणारा ‘राशोमान’

---------------------------------


काही वर्षांपूर्वी मी पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आयोजित केलं जाणारं (आणि महत्त्वाचं म्हणजे मराठीतून चालणारं) एक आठवड्याचं रसास्वाद शिबिर अटेंड केलं होतं. माझ्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा व मोलाचा अनुभव होता. त्यातही या शिबिरात आम्हाला दाखवला गेलेला अकिरा कुरोसावाचा ‘राशोमान’ हा चित्रपट पाहून मी थरारून गेलो. तब्बल ७० वर्षांपूर्वी निघालेला हा सिनेमा मी आठ वर्षांपूर्वी प्रथम पाहिला. त्यानंतर अनेकदा पाहिला. दर वेळी मला या चित्रपटानं वेगळी अनुभूती दिली आहे; माझ्या धारणा बदलल्या आहेत. ‘सत्य म्हणजे काय?’, ‘जगात एकच एक सत्य असतं का?’, ‘ज्याला जसं दिसतं तसं सत्य असतं का?’ या आणि अशा अनेक मूलभूत प्रश्नांना हात घालणारा हा चित्रपट म्हणूनच माझ्या मनावर खोलवर ठसा उमटवून गेला आहे.
त्यामुळंच १९५० मध्ये प्रदर्शित झालेला ‘राशोमान’ (याचे उच्चार राशोमोन, राशोमन असेही केले जातात!) हा चित्रपट जागतिक अभिजात चित्रपटांमध्ये गणला जातो. मानवी जीवनावर, वर्तनावर मूलभूत चिंतन करणारे चित्रपट नेहमीच कलात्मक आणि वैचारिक उंची गाठताना दिसतात. ‘राशोमान’ हा याच वर्गातला चित्रपट. रायुनोसुक अकुतागावा यांच्या ‘राशोमान’ याच नावाच्या लघुकथेवरून या चित्रपटाचं शीर्षक घेण्यात आलं असलं, तरी प्रत्यक्षात अकुतागावा यांच्यात ‘इन ए ग्रोव्ह’ या दुसऱ्या लघुकथेवर आधारित या चित्रपटाचं कथानक रचण्यात आलं आहे.

जपानमधील ग्रामीण भागात असलेल्या 'राशोमान' या भग्नावस्थेत असलेल्या, भव्य लाकडी प्रवेशद्वाराच्या दृश्यानं चित्रपटाची सुरुवात होते. दर वेळी हा सिनेमा सुरू झाला की हे दृश्य आणि त्या वेळी कोसळत असलेला भयंकर पाऊस आपलं लक्ष वेधून घेतात. आपण अगदी सावरून पुढं काय होणार ते बघू लागतो. या लाकडी प्रवेशद्वाराच्या खाली असलेल्या जागेत एक लाकूडतोड्या आणि एक तरुण धर्मगुरू बसलेला आहे. त्या दोघांनीही तीन दिवसांपूर्वी एक भयानक घटना बघितली आहे. प्रचंड पाऊस कोसळत असल्यामुळं आणखी एक माणूस तिथं आश्रयाला येतो. हे दोघं मग त्या माणसाला त्या घटनेविषयी सांगतात. ती घटना असते जंगलात झालेल्या एका खुनाची. त्या लाकूडतोड्यानं एका माणसाच्या मृतदेहाचे हात बघितलेले असतात. त्यानंतर तो घाबरून तिथून पळून जातो. नंतर त्या खुनाचा खटला सुरू होतो, तेव्हा कोर्टासमोर सगळी हकीकत आपल्यासमोर उलगडत जाते. त्या दिवशी जंगलात घोड्यावरून एक सुंदर तरुणी आणि सोबत चालत तिचा सैनिक (समुराई) पती जात असताना ‘ताजोमारू’ नावाचा त्या भागातला कुख्यात दरोडेखोर त्यांना पाहतो. त्याच वेळी किंचित वारा येतो आणि त्या तरुणीच्या चेहऱ्यावरील पडदा हलतो. तेव्हा तिच्या अप्रतिम सौंदर्याचं दर्शन त्या दरोडेखोराला होतं. त्याच्या मनात तिच्याविषयी अभिलाषा उत्पन्न होते. त्यानंतर जे काही घडतं, त्याची तीन वेगवेगळी रूपं तिथल्या आपल्याला पाहायला मिळतात. दरोडेखोराचं, त्या तरुणीचं आणि मृत सैनिकाचं... (मृत सैनिकाचं म्हणणं प्लँचेटद्वारे ऐकायला मिळतं.) हे तिघेही कोर्टासमोर आपला जबाब देत असतात. या तिघांचंही म्हणणं ऐकल्यावर लाकूडतोड्या स्वतःचं चौथं (आणि आधीच्या तीन कहाण्यांपेक्षा वेगळंच) म्हणणं सांगतो. हे पाहिल्यावर नक्की काय घडलं, याविषयी आपल्याही मनात संभ्रम उत्पन्न होतो. सत्य नक्की काय, याविषयी आपण विचार करू लागतो. चित्रपटाच्या शेवटाकडं दिग्दर्शक याचं सकारात्मक उत्तर देतो. चित्रपट संपल्यानंतरही आपण त्या कथानकात आणि महत्त्वाचं म्हणजे दिग्दर्शकानं उपस्थित केलेल्या मूलभूत प्रश्नाचं चिंतन करण्यात गुंग होऊन जातो, हे या कलाकृतीचं सर्वांत मोठं यश!
मी हा सिनेमा पाहिल्यानंतर आपल्यावर असा, एवढा खोलवर परिणाम याआधी कुठल्या चित्रपटानं केला आहे, हे आठवू लागलो. ‘संत तुकाराम’पासून ते ‘वास्तुपुरुष’पर्यंत आणि ‘पथेर पांचाली’पासून ‘गँग्ज ऑफ वासेपूर’पर्यंत अनेक चित्रपट डोळ्यांसमोरून गेले. जागतिक चित्रपट महोत्सवांत मी यापूर्वीही अनेक परकीय भाषांतले चित्रपट पाहिले होते. मात्र, एवढा खोल परिणाम अन्य कुठल्याही चित्रपटाचा माझ्यावर झालेला मला आठवत नाही. ‘राशोमान’नंतर मात्र माझी विचारांची दिशाच बदलून गेली. मानवी आयुष्याकडं, जगण्याकडं बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन मला या कलाकृतीनं दिला.
याबाबत अधिक विचार केल्यावर लक्षात येतं, की या विचारांचं मूळ त्या कलाकृतीतच दडलेलं आहे. कुरोसावा यांनी या चित्रपटाची मांडणी मोठी वेधक केली आहे. चित्रपट माध्यमाची ताकद त्यातून लक्षात येते. चित्रपटाचं पार्श्वसंगीत अप्रतिम आहे. किंबहुना संपूर्ण चित्रपटात या पार्श्वसंगीतानं एखाद्या पात्रासारखी भूमिका बजावली आहे. चित्रपट जुन्या काळातला आणि कृष्णधवल असला, तरी 'राशोमान' गेटवर प्रचंड कोसळणारा पाऊस आणि तिथं बसलेली तीन माणसं हे दृश्य अंगावर काटा आणतं. चित्रपटाची सुरुवात आणि शेवट वेधक आहे. सुरुवातीला भरून आलेलं आभाळ आणि कोसळणारा पाऊस, तर शेवटच्या दृश्यात मोकळं झालेलं आकाश आणि स्वच्छ पडलेलं ऊन हे अगदीच प्रतीकात्मक आणि सहज लक्षात येण्यासारखं आहे.
या चित्रपटात तोशिरो मिफुने या प्रख्यात जपानी अभिनेत्यानं ताजोमारू या दरोडेखोराची भूमिका केली आहे. मिफुने यांनी कुरोसावा यांच्या एकूण १६ चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. त्यापैकी ही दरोडेखोराची भूमिका खास समजली जाते. याशिवाय तकाशी शिमुरा यांनी लाकूडतोड्याची, मिनोरू चिआकी यांनी तरुण धर्मगुरूची, तर माचिको क्यो हिनं तरुणीची भूमिका केली आहे. या सर्वांनी आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत. चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असताना यापैकी कुणाही कलाकाराला चित्रपटाचा शेवट काय आहे, हे माहिती नव्हतं, म्हणे! त्यामुळे ते कुरोसावा यांच्याकडं चित्रपटाचा शेवट सांगण्यासाठी हट्ट करीत असत. चित्रपट तयार झाल्यानंतर कुरोसावा यांना एकच एक असं सत्य सांगायचंच नव्हतं; तर सत्य नावाची गोष्ट मुळात अस्तित्वात आहे का; की ती व्यक्तिपरत्वे बदलते, याच मुद्द्यावर लक्ष वेधायचं होतं, हे सर्वांच्या लक्षात आलं.
या चित्रपटाचं महत्त्व म्हणजे या चित्रपटामुळेच जपानी चित्रपट जागतिक स्तरावर पोचला. या चित्रपटाने व्हेनिस चित्रपट महोत्सवात (१९५१) प्रतिष्ठेचा गोल्डन लायन पुरस्कार पटकावला. याशिवाय १९५२ च्या ऑस्कर सोहळ्यात या चित्रपटाला अॅकॅडमी ऑनररी पुरस्कारानं गौरविण्यात आलं. मुळात हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा जपानमध्ये त्याचं फार काही जोरदार स्वागत झालं नव्हतं. किंबहुना काही टीकाकारांनी या चित्रपटावर टीकाच केली होती. मात्र, अमेरिकेत व पाश्चात्त्य जगात या चित्रपटाचे कौतुक झाल्यावर जपानमधील समीक्षकही गोंधळले होते. हा चित्रपट म्हणजे दुसऱ्या महायुद्धात जपानच्या झालेला पराभवाचं समर्थन करण्याच्या मानसिकतेतून आलेली कलाकृती आहे, असाही काही समीक्षकांनी या चित्रपटाचा अर्थ लावला होता. अर्थात सत्याचा शाश्वत शोध हाच हा सिनेमाचा मूलाधार असल्यानं तो जगभरातल्या प्रेक्षकांना आवडला आणि आज तो जगातील काही सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो.

मला स्वत:ला हा चित्रपट याच कारणासाठी भावला, आवडला, पटला! हा चित्रपट पहिल्यांदा पाहणारा माणूस ‘सत्य’ या संकल्पनेविषयी आपल्या मनात चित्रपट पाहण्यापूर्वी असलेल्या धारणा नक्कीच तपासून बघितल्याशिवाय राहणार नाही, याची मला अगदी खात्री वाटते. ‘सत्यमेव जयते’ हे आपलं राष्ट्रीय वचन आहे. अगदी लहानपणापासून आपल्याला नेहमी खरं बोलावं, खरं वागावं अशी शिकवण दिली जाते. पण हे खरं म्हणजे काय, सत्य म्हणजे नक्की काय, याचा उलगडा काही होत नाही. आयुष्यात पुढं आपण मोठे झालो, टक्केटोणपे खाऊन शहाणे झालो, तरी या विचाराचा पिच्छा काही सुटत नाही. जसजसे आपण मोठे होत जातो, आपलं अनुभवविश्व समृद्ध होत जातं तसतसं सत्य नावाच्या ‘साक्षात्कारा’ची वेगवेगळी ओळख पटू लागते. त्यातून संभ्रम वाढतच जातो. एकच घटना दोन वेगळ्या ठिकाणांहून बघणाऱ्या लोकांना वेगळी दिसते. त्यांना जे दिसतं, तेच त्यांच्यापुरतं सत्य असतं. असं असेल तर मग एकच एक, शाश्वत असं सत्य असतं तरी काय? आपली जडणघडण, आपल्या विचारांची बैठक, धारणांचा पाया नक्की कुठल्या गृहीतकांवर आधारित आहे? मग जर हा पायाच ठिसूळ असेल तर त्यावर आधारलेली सगळी नीतिमूल्यं झूठ ठरवायची का? की मुळात हे सगळे मनाचे खेळ आहेत? आपल्या कृत्यांचं समर्थन करण्यासाठी माणसाचा अत्यंत हुशार मेंदू तर या वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधून काढत नाही ना? याला हे म्हणायचं, त्याला ते म्हणायचं हे सगळं ठरवलं कुणी? आदिम प्रेरणांपासूनचा हा प्रवास नक्की कुठल्या घटकांवर आधारलेला आहे? संस्कृती म्हणजे तरी नक्की काय? आदिम प्रेरणांचं नियमन करणाऱ्या या चौकटी मोडण्यासाठी तर मानवी मनाचे हे निरनिराळे खेळ सुरू नाहीत ना? आपण जे काही वागतो, बोलतो त्याला एक प्रामाणिकपणाचं, सत्याचं कथित अधिष्ठान दिलं, की मग माणूस मोकळा होतो. त्याला या कृत्यांविषयी लाज वाटत नाही, की पश्चात्ताप होत नाही. पण मग स्वत:च्या मनालाही फसवू शकेल अशी कुठली ‘सत्य’ नावाची बाब अस्तित्वात तरी असू शकते काय? एक ना दोन... अशा नाना प्रश्नांनी मन भोवंडून जातं. ‘राशोमान’मधली कथा आणि त्यातल्या पात्रांचं वर्तन पाहून सतत हेच विचार मनात पिंगा घालायला लागतात.
मग लक्षात येतं, की दिग्दर्शकानं या सर्व कथेतून हाच मूलभूत विचार उपस्थित केला आहे. तो वाचून आपले सत्य या संकल्पनेविषयीचे सर्व पूर्वग्रह गळून पडतात आणि आपण तिचा नव्यानं विचार करायला लागतो. माझ्या मते, एखाद्या कलाकृतीचं हे यश फार मोठं मानायला हवं. कलाकृतीचा आस्वाद घेताना ती केवळ पंचेद्रियांना सुखावणारी न राहता, मेंदूपर्यंत घुसून तिथल्या विचार केंद्रांना चालना देत असेल, तर ती कलाकृती निखालस मोठी! ‘राशोमान’ ही अशीच कलाकृती आहे. हा सिनेमा पुन:पुन्हा बघताना त्यातले अर्थ नव्यानं उलगडत जातात. आपलं वय वाढतं, आपली विचारक्षमता वाढते, अनुभवविश्व वाढतं, तसं या कलाकृतीचा आवाकाही नव्यानं समजू लागतो. तब्बल ७० वर्षांपूर्वी तयार झालेला हा कृष्णधवल चित्रपट आपल्याला अजूनही नवनवे विचार देत आहे, आपल्या धारणांना धक्का लावतो आहे. त्या अर्थानं आता ‘राशोमान’चा आयुष्यावर पडलेला कायमस्वरूपी प्रभाव हेही एक निखळ ‘सत्य’च आहे! 

----

(पूर्वप्रसिद्धी : दृष्टी-श्रुती डिजिटल दिवाळी अंक २०२०)

---

22 Feb 2021

समदा दिवाळी अंक २०२० लेख

 अन्नपूर्णा आणि अन्नपूर्णा २.०

-----------------------------------

आमचं गावाकडचं जुनं धाब्याचं घर आहे... सलग सात खणांचं... त्यातल्या एका कोपऱ्यात स्वयंपाकघराचा उंचवटा आहे... त्या उंचवट्याच्या कोपऱ्यात चूल आणि वैल आहे. चूल धडाडून पेटली आहे. त्यावर तापलेला तवा आहे. मी त्या उंचवट्याच्या खाली ताट समोर घेऊन बसलो आहे. माझी आजी त्या चुलीशेजारी हातात फुंकणी घेऊन चुलीत फूंक मारते आहे. चुलीतल्या धुरामुळं तिचे डोळे तर चुरचुरताहेतच, पण मलाही एवढ्या लांब ती धग लागते आहे... पण पोटातली भुकेची धग त्याहून मोठी आहे... म्हणून मी दटून तिथंच बसलो आहे... मग तव्यावरची गरमागरम भाकरी पुढच्या मिनिटाला माझ्या ताटात येते आहे आणि ताटातल्या ताकातल्या पिठल्यासोबत मी ती पेढ्यासारखी अत्यंत रुचकर भाकरी खातो आहे...

आजी आणि आईच्या हातचं जेवण हा विषय प्रत्येकालाच प्रिय असा! आपला शब्दश: पिंड ज्यावर पोसला आहे असं हे खाण्याचं नातं... या दोघींशी जसा आपला रक्ताचा संबंध असतो, तसा आणि तितकाच लहान आतड्याचा, मोठ्या आतड्याचा, जठराचा, यकृताचा, अन्ननलिकेचा, स्वादुपिंडाचा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे जिभेचाही संबंध असतो. शेतात पडलेलं बीज आणि त्यातून वर आलेल्या धान्याच्या कोंभाइतकंच हे नातं जैव असतं... त्यामुळंच बालपणीच्या या दोघींशी संबंधित सगळ्या आठवणी त्यांच्या हातून खाल्लेल्या पदार्थांच्याच जास्त आहेत. बायकोच्या हातच्या पदार्थांना आईच्या हातची चव येत नाही आणि आईच्या हाताला ती चव यायला आजीच्या हाताखाली अनेक वर्षं उमेदवारी करावी लागते, असं आपल्याकडं म्हणतात त्यामागं हेच कारण असावं. वर्षानुवर्षं हाताला चटके सोसत या माउल्यांनी आपल्या जिभेचे चोचले पुरवले. त्याची सर आता कशाला येणं शक्य नाही...

आमच्या आजीचं नाव काशीबाई. ती माहेरची देशमुख. जामखेडच्या गढीवरच्या देशमुखांचं तालेवार माहेर. त्यामुळं तिच्या अंगात तो ‘देशमुखी’ तोरा शेवटपर्यंत होता. आमचं गाव तसं दुष्काळी! बऱ्याच गोष्टींचा अभाव... पण या जामखेडच्या मातीत ज्वारी उत्कृष्ट दर्जाची पिकते. आमच्या शेतातून घरी ज्वारी यायची आणि आमच्या बाहेरच्या घरात निम्म्या भागात पोती ओतली जायची. शेजारी आधाराला उरलेली पोती लावली जायची. आम्ही भावंडं त्या पोत्यावर चढून त्या ज्वारीत उड्या मारायचो. ज्वारीत खेळून खेळून पाय पांढरेफटक व्हायचे. ‘अन्नधान्याने घर भरू दे,’ ही म्हण आमच्या घरात शब्दश: मूर्त व्हायची. अर्थात ज्वारी घरातली खूप असली, तरी आमच्या रोजच्या जेवणात भाकरी नसायची. पोळी, भाजी, कोशिंबिरी, चटण्या, भात आणि वरण असाच सर्वसाधारण घरांत असतो, तसा रोजचा मेनू असायचा. 

आमच्या आजीमधली सुगरण खऱ्या अर्थानं दिसायची ती सणावाराला. तेव्हा तिचा कडक सोवळ्यात स्वयंपाक असायचा. होळी, श्रावणातले चारही शुक्रवार, पोळा, नवरात्र, दसरा, खंडोबाचं नवरात्र हे प्रमुख सण घरात साजरे व्हायचे. त्यात दोन्ही नवरात्रांत आणि श्रावणात कुळधर्म, कुळाचार चाले. श्रावणातल्या चारही शुक्रवारी घरात पुरणावरणाचा ज्याचा ‘चारी ठाव’ म्हणतात तसा स्वयंपाक असायचा. माझी आजी तिच्या साठीपर्यंत सगळा स्वयंपाक एकहाती करायची. नंतर सुना आल्यावर तिनं फक्त पुरणपोळ्यांचं काम स्वत:कडं घेतलं आणि बाकी स्वयंपाक माझी आई व काकू मिळून करू लागल्या. ती सवाष्ण बारा वाजता जेवायला यायच्या आत हा सगळा स्वयंपाक तयार असायचा. त्यासाठी या बायका पहाटेच उठून कामाला लागायच्या. पुरणाचा घाट मोठा असायचा. मी जरा मोठा झाल्यावर कधी कधी पुरणयंत्रांतून पुरण हाटण्याचं काम मला मिळे. पण हे खूप नंतर! त्यापूर्वी आजी पाटा-वरवंट्यावरच पुरण घालत असे. मात्र, आजीची पुरणपोळी कमाल असायची. अगदी रेशमासारखी नाजूक, नेमकी गोड आणि अजिबात पुरण बाहेर न सांडणारी अशी बांधीव पोळी आजी करायची. तांबूस, लालसर रंगाची ती पोळी वरून साजूक तूप घातल्यावर आणखीनच देखणी दिसायची. तिचा पहिला घास तोंडात गेला, की चटका बसायचाच. पण तो चटका सोसत सोसत ती पोळी घशाखाली उतरवण्याच्या आनंदाला ‘स्वर्गीय’ एवढा एकच शब्द मला सुचतो. खरं सांगायचं, तर त्या लहान वयात या अन्नपदार्थांचं मोल आम्हाला कितपत कळलं होतं कोण जाणे. तो दर्जा आम्ही जणू गृहीतच धरला होता. नंतर आयुष्यात घराबाहेर पडायची, होस्टेलवर राहण्याची, मेसमधला गार डबा खाण्याची वेळ आली, तेव्हा डोळे खाडकन उघडले. आजी आपल्याला काय उत्तम दर्जाचं जेवण करून खायला घालत होती, हे समजलं. आजीसारखीच तिची मोठी मुलगी, म्हणजे माझी थोरली आत्या सुगरण होती. अक्षरश: अन्नपूर्णाच ती! तिच्या हाताला जी चव होती, त्याचं वर्णन करणं अशक्य आहे. कुठलाही पदार्थ सांगा, तिला तो जमत नाही किंवा तिचा तो बिघडलाय, हे मी कधीच पाहिलेलं नाही. या माझ्या आत्यानंही आमच्या जिभेचे भरपूर चोचले पुरवले. वास्तविक पुरणपोळी खावी तर माझ्या आजीच्या हातचीच! (हे प्रत्येक जण म्हणत असतो, हे मला ठाऊक आहे आणि ते प्रत्येकाच्या बाबतीत तेवढंच खरं आहे. याचं कारण आपल्यावर लहानपणी त्या खाण्याचा झालेला संस्कार!) पण खरोखरच आमच्या आजीची पुरणपोळी रेशमासारखी असायची. त्या काळातल्या बहुतेक बायका अशाच सुगरण असायच्या. पण प्रत्येकीच्या हातची चव वेगळी! आमच्या आत्यानं तिच्या आईचा हा गुण केवळ उचललाच होता असं नाही तर तिनं त्या गुणाचा भरपूर विस्तारही केला. माझे आजी-आजोबा शिरूरला अनेक वर्षं राहिले. आत्या ही त्यांची सर्वांत थोरली मुलगी. तिचं लग्न पुण्यात मकाशीर कुटुंबात झालं आणि ती पुणेकर झाली. आधी कसबा गणपतीजवळ आणि नंतर साततोटी हौदाजवळ फुलंब्रीकर वाड्यात तिनं अनेक वर्षं संसार केला. वाड्यातली खोली होती दहा बाय दहाची... आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत गावावरून तिच्याकडं यायचो आणि आठ-आठ दिवस मुक्काम ठोकायचो. आत्या, तिचे यजमान, माझी दोन्ही आत्येभावंडं यांनी कधीही पाहुणे आले म्हणून कुरकुर केल्याचं मला आठवत नाही. उलट त्या वाडासंस्कृतीची मला लहानपणीच (पुण्यात राहत नसूनही) ओळख झाली. त्या छोट्याशा खोलीत आत्याचा संसार आणि तिचा सुगरणीच्या वरताण स्वयंपाक चालायचा. 

आम्ही देशस्थ आणि त्यात गावाकडचे! आमच्याकडं तळणीच्या मोदकांची पद्धत! उकडीचा मोदक हा पदार्थ मी सर्वप्रथम खाल्ला तो या आत्याच्या हातून... तिच्या हातचे उकडीचे मोदक कधीही बिघडले नाहीत. उलट, तिच्यासारखे उत्कृष्ट मोदक मी आजतागायत कुणाचेच खाल्ले नाहीयेत. मी नंतर पुण्यात शिकायला आलो, तरी सणावाराचं माझं गोडधोड खाणं आत्यानं कधी चुकू दिलं नाही. मी जेवायला आपला कायम त्यांच्याकडे! ती गरमागरम उकडीचे मोदक वाढायची, तुपाची धार सोडायची... बाकी काही खाऊ नकोस; फक्त मोदक खा, म्हणायची. मी वेड्यासारखा एखादा मोदक शेवटी खायचो. बाकी भाजी-पोळी खात बसायचो. जेव्हा आपल्याला मिळत असतं, तेव्हा आपल्याला त्याची किंमत नसते, हेच खरं. माझी ही आत्या दहा वर्षांपूर्वी कर्करोगानं गेली. तिला अन्ननलिकेचा कर्करोग झाला होता. तिला शेवटी शेवटी एक घासही खाता यायचा नाही. आयुष्यभर दुसऱ्याला खाऊ घालण्यात आनंद मानणाऱ्या माझ्या या ‘मोठ्या आई’ला शेवटी शेवटी काहीही खाता येत नव्हतं... तिला अन्नच घेता येत नव्हतं... दैवानं केलेला यापेक्षा क्रूर विनोद माझ्या पाहण्यात नाही! 

आजी आणि मोठ्या आत्याच्या तालमीत तयार झालेल्या माझ्या आईच्या हातचा स्वयंपाकही असाच उत्कृष्ट असतो. आईचं माहेर मराठवाड्यातलं. त्यामुळं तिच्या आईच्या हातचे मराठवाडी पदार्थ ती सहज करते. त्यात एसर आमटी किंवा शेंगोळ्यांसारखे पदार्थ तिचे खास फेव्हरिट. आईचा असाच एक पेटंट पदार्थ म्हणजे गव्हाची खीर. आईच्या हातून ज्यांनी ज्यांनी हा पदार्थ खाल्लाय त्यांनी कायमच तिच्याकडं वारंवार त्या खिरीची फर्माईश केलीय. आईचा कधीही न बिघडणारा आणखी एक पदार्थ म्हणजे ओल्या नारळाच्या वड्या. खरं तर आईचा कोकणाशी काहीही संबंध नाही. मात्र, तिच्या सर्व जमणाऱ्या पदार्थांमध्ये नारळाचा समावेश असतो. गव्हाच्या खिरीतही त्या नारळाचं दूध लागतंच. माझ्या लहानपणी आम्ही एकत्र कुटुंबात राहिलो. आजी-आजोबा, माझी धाकटी आत्या (तिचं लग्न होईपर्यंत), माझा काका, नंतर काकू आणि आम्ही एकूण सहा भावंडं... आई प्रत्येकाची आवड-निवड जपत स्वयंपाक करायची. आत्याला लसूण चालायचा नाही. मग तिची भाजी वेगळी... बाकीच्यांची वेगळी. काकाला दही-साखर जेवणात आवडायचं. मग आवर्जून त्याच्यासाठी ती वेगळी दही-साखरेची वाटी काढून ठेवायची... (यावरून एक आठवलं. मला लहानपणी एक विचित्र म्हणावी अशी सवय होती. मला मध्यरात्री जाग यायची व तेव्हा प्यायला मला दूध लागे. आई माझ्या उशाशी दुधाचा कप वर बशी पालथी घालून ठेवायची. मी मध्यरात्री उठून बशीत ते गार दूध ओतून प्यायचो. मला त्यातली साखर ढवळलेली चालायची नाही. मी ती साखर नंतर चमच्याने खायचो.) घरी आलेले पाहुणे सकाळच्या एसटीनं परत जाणार असले, तरी सकाळी सात वाजता त्यांना साग्रसंगीत जेवू घालायचा कार्यक्रम घरी चालायचा. शक्यतो बाहेरचं खाणं टाळण्याकडं कल असायचा. त्यामुळं बाहेर कुठंही जायचं झालं, तरी घरून डबा नेणं ही सर्वमान्य रीत होती. नाही तर दुसऱ्याकडं मेहुण म्हणून, मुंजा म्हणून वा कुमारिका म्हणून जेवायला जाणे हे सर्वांत सोपं होतं!

गावी शाळेत डबा नेण्याची पद्धत नव्हती. सकाळी तीन तास आणि दुपारी तीन तास शाळा भरे. मधला वेळ सरळ घरी यायचं. नंतर माध्यमिक शाळेतसुद्धा घर एवढं जवळ होतं, की दुपारच्या वीस मिनिटांच्या मधल्या सुट्टीत दुपारचा चहा प्यायला घरी यायचो. पुढं नगरमध्ये शाळेत जायला लागल्यावर डबा हा प्रकार आयुष्यात आला. तिथं पोळी, लोणचं आणि एक भाजी हा ठरलेला मेनू असायचा. इतर मित्रांचे डबे उघडले, की मग त्यासोबत त्यांचं सगळं जगणंच नकळत समोर उलगडायचं. काही काही मित्र डबाच आणायचे नाहीत. टाइमपास करत बसायचे. ते डबा का आणत नसतील, हा प्रश्न तेव्हा पडलाच नाही. आता पोटात तुटतं! अर्थात शाळेतल्या वयात असलेला निरागसपणा अंगी होता. तेव्हा कुणीही कुणाच्याही डब्यात हात घालून सहज काहीही खाऊ शकत होता. मीही आपल्या घरी होणाऱ्या भाजीपेक्षा वेगळ्या चवीच्या भाज्या पहिल्यांदा या डब्यांतूनच चाखल्या. तिखटाची ‘गोडी’ लागली ती तिथपासून! एरवी आमच्या घरचं जेवण म्हणजे टिपिकल मध्यमवर्गीय, ब्राह्मणी आणि अळणी! पण आई त्या पदार्थांनाही अशी चव आणते, की विचारू नका. साधी फोडणीची पोळी किंवा फोडणीचा भात असू देत. मला तर वाटतं, महाराष्ट्रातील काही पिढ्याच्या पिढ्या फोडणीची पोळी वा फोडणीचा भात या ब्रेकफास्टवर लहानाच्या मोठ्या झाल्या असतील.

आईच्या हातचं खाणं हा कुठल्याही मुलासाठी 'वीक पॉइंट' असतो आणि त्या भावनेभोवतीच्या सर्व भावनोत्कट बाबी बाजूला ठेवल्या, तरी आमची पिढी घरच्या खाण्याबाबत आजच्या पिढीपेक्षा जास्त समृद्ध होती आणि म्हणूनच जास्त फिट आहे, असं आवर्जून सांगावंसं वाटतं. 

आमच्या लहानपणी गावात बेकरी नव्हतीच. तेव्हा पाव किंवा मैद्याचे अन्य पदार्थ फार उशिरा आयुष्यात आले. अगदी बिस्कीटही खाण्याची फार क्रेझ नव्हती. हे सगळं बालपण संपल्यावर, शहरात गेल्यावर मनसोक्त खायला मिळालं. मात्र, त्यामुळं घरचं सकस अन्न खाऊन लहानपणी जी सुदृढता लाभली ती आजही उपयोगी पडते आहे. आमच्या शेतात पेरूच्या झाडावर बसून, तिथले पेरू तोडून तिथंच खाण्याचं भाग्य मला व माझ्या भावंडांना लाभलं. घरच्या शेतातला गहू, ज्वारी, बाकीचा भाजीपाला खाण्याचं सुख अनुभवता आलं. खूप श्रीमंती होती असं नाही, पण कधी काही कमी पडलं नाही. खाण्या-पिण्यात तर मुळीच नाही. साधं-सुधं, पण सकस व महत्त्वाचं म्हणजे गरमागरम जेवण दोन्ही-तिन्ही वेळांना पोटात जात होतं.

संक्रांतीच्या आधी, ऐन थंडीत धुंधुरमासाचं जेवण हा एक सोहळा असायचा. सकाळी आई लवकर उठून बाजरीची भाकरी, लोणी, वांग्याचं दही कालवलेलं भरीत, तिळाची चटणी असं ताट समोर ठेवी. भावंडांत गप्पागोष्टी करता करता हे जेवण सकाळी कधी संपायचं ते कळायचंही नाही. तीच परिस्थिती भोगीची. ती भोगीची टिपिकल मिक्स भाजी घरात व्हायचीच. आमच्याकडं महालक्ष्म्या यायच्या, तेव्हाही पुरणा-वरणाचा नैवेद्य असायचाच; पण जोडीला  त्या सोळा भाज्या साग्रसंगीत घरी केल्या जायच्या. महालक्ष्मीच्या नैवेद्याचं ताट संपवणं हे एक आव्हान असायचं. घरात अनेकदा मुंजा मुलगा म्हणून मलाच नैवेद्याचं ताट मिळायचं. त्यात काहीही टाकून द्यायचं नाही, अशी अट असायची. पहिल्यांदा कंटाळा यायचा. विशेषत: पंचामृत वगैरे प्रकार भातात कालवून वगैरे शेवटी एकत्र संपवायचे हे मला अजिबात आवडायचं नाही. पण आजूबाजूचे सगळे ज्येष्ठ तसंच जेवतात, हे पाहून मीही तसंच करायला लागलो. त्या अटीमुळं एक मात्र झालं. ताट स्वच्छ करायची सवय लागली. कुठलाही पदार्थ कुरकुर न करता खायची चांगली सवयही लागली. मुळात आई सुगरण असल्यानं ती करत असलेलं काहीही आम्ही मिटक्या मारीत खायचोच आणि आजही खातो. त्यामुळं तिथं अमुक एक आवडत नाही वगैरे प्रश्नच उपस्थित व्हायचा नाही.

माझी आजी मी १८ वर्षांचा असतानाच गेली. म्हणजे तसा तिचा फार सहवास मला लाभला नाही. मात्र, तिनं तिचा सगळा वारसा तिच्या थोरल्या मुलीकडं आणि माझ्या आईकडं सोपवला होता, असं म्हणायला हरकत नाही. या तिन्ही माउल्यांनी माझं केवळ शारीरिक भरणपोषण केलं असं नाही, तर माझ्या संपूर्ण आयुष्याचा निरोगी, सुदृढ पायाही भक्कमपणे रचला. आज मी जो काही आहे, तो त्यांच्या हातचं चवीष्ट अन्न खाऊन आणि पचवून...!

---


(पूर्वप्रसिद्धी : समदा दिवाळी अंक २०२०)

--------