13 Dec 2022

दमण-मुंबई डायरी - उत्तरार्ध

मुंबई मेरी जान...
---------------------


तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दमण सोडलं. तिथल्या एक सोमनाथ मंदिरात आम्हाला जायचं होतं. हे मंदिर वापीच्या बाजूला वाढलेल्या दमण शहरात होतं. वापी आणि दमण हे जोड-शहर आहे, हे त्या भागात गेल्यावर कळलं. मधे फक्त एक कमान आहे. ती ओलांडली, की आपण वापीत - म्हणजेच गुजरातमध्ये - प्रवेश करतो. तिथून अहमदाबाद-मुंबई महामार्गही अगदी जवळ आहे. आम्ही त्या महामार्गावर पोचलो आणि उजवीकडं वळलो. समोर जाणारा रस्ता सिल्व्हासाकडे जाणारा होता. आम्ही तिथंही जाणार होतो. मात्र, तिथलं एक आदिवासी संग्रहालय बंद असल्याचं समजलं आणि एका लायन सफारीबद्दल फार काही चांगले रिव्ह्यू ‘गुगल’वर नव्हते. सिल्व्हासा परिसरात मोठमोठे कारखाने आणि उद्योगधंदे आहेत. महामार्गावरून मुंबईकडं निघाल्यावरही ते दिसलं दोन्ही बाजूंनी... आम्हाला भूक लागली होती. अखेर एक बरं हॉटेल बघून गाडी थांबवली. तिथं भरपूर ट्रक थांबले होते. तो ट्रकवाल्यांचा नेहमीचा अड्डा असणार. आम्ही तिथं जाऊन आलू पराठे ऑर्डर केले. मैद्याच्या पोळीचे, शंकरपाळ्यांसाठी जसे आकार कापतात, तसे कापलेले तुप्पाळ आलू पराठे समोर आल्यावर आम्हाला हसावं की रडावं तेच कळेना. त्यासोबत चक्क फोडणीचं वरण दिलं होतं. मग लक्षात आलं, ट्रकवाल्यांचा हा आवडता आहार असणार. भुकेपोटी खाल्ल्यावर वाटलं, एवढाही काही वाईट नव्हता. चहा मात्र झकास मिळाला. 
तिथून पुढं गाणी ऐकत, गप्पा मारत प्रवास झाला. आता ठाण्याऐवजी आम्हाला सरळ मुंबईत शिरायचं होतं. मी पहिल्यांदाच एवढ्या उत्तरेकडून मुंबईत शिरत होतो. तिथंही तो डोंगराळ भाग लागला. तो ओलांडल्यावर आम्ही एकदम मीरा-भाईंदरमध्ये आलो. उंचच उंच इमारतींनी आपण मुंबईत असल्याचं दाखवून दिलं. तिकडं मेट्रोची कामंही सुरू होती. ट्रॅफिक जॅम लागला हे वेगळं सांगायला नको. रस्त्यात एके ठिकाणी पेट्रोल भरायला थांबलो. पण तिथं कार्ड चालत नव्हतं, म्हणून केवळ पाचशे रुपये रोख देऊन तात्पुरतं पेट्रोल भरलं. नंतर पुढं भरू म्हणत आम्ही थेट मुंबईत आलो. आता पेट्रोल संपलं होतं व तातडीनं भरायचं होतं. मात्र, आम्हाला एकही पेट्रोलपंप दिसेना. अखेर गोरेगावात डाव्या बाजूला पंप मिळाला आणि आम्ही हुश्श केलं. आमचं वेस्ट एंड हॉटेल थेट दक्षिण मुंबईत (बॉम्बे हॉस्पिटलसमोर) होतं. पेट्रोल पंपापासूनही एक तास अंतर दाखवत होतं. मग साईनाथकडं गाडी दिली. हळूहळू अंधेरी, वांद्रे करीत सागरी सेतूमार्गे आम्ही दक्षिण मुंबईत शिरलो. सकाळी निघाल्यापासून बरोबर पाच तासांनी आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो होतो.

हॉटेल अगदीच बॉम्बे हॉस्पिटलच्या समोर होतं. हेरिटेज टाइप वाटत होतं. आम्ही रूम ताब्यात घेतल्या आणि जरा आवरून लगेच जेवायला बाहेर पडलो. तसा हेवी ब्रंच झालेला असल्यामुळं फार भूक नव्हतीच. हॉटेल शेजारीच एक लिबर्टी नावाचं उपाहारगृह होतं. तिथं जाऊन पुरी-भाजी, पावभाजी, सँडविच या टाइप प्रत्येकानं काही ना काही खाल्लं. इथून आम्हाला क्रॉफर्ड मार्केटमध्ये जायचं होतं. मी मुंबईत अनेकदा आलो असलो, तरी क्रॉफर्ड मार्केटमध्ये भटकलो नव्हतो. मग आम्ही चौघंही संध्याकाळी साडेचार-पाचपासून तिथं मनमुराद भटकलो. जाताना चालतच गेलो. मेट्रो सिनेमावरून (वासुदेव बळवंत फडके चौक) जाताना ‘२६-११’ची आठवण आली आणि पाठीतून थंड लहर गेली. त्या चौकात वासुदेव बळवंतांचा एक दणकट अर्धपुतळा आहे. हा मी पाहिला नव्हता. चालत निघाल्यानं सगळं बारकाईनं बघता आलं. क्रॉफर्ड मार्केटमध्ये अपेक्षेप्रमाणे तोबा गर्दी होती. मात्र, स्वस्तात मस्त वस्तूंचं आमिषही मोठं होतं. तिथं मनाजोगती खरेदी झाल्यावर आम्हाला चहा घ्यायचा होता. मग तिथं कामत नावाचं एक हॉटेल होतं, तिथं जाऊन झकास चहा घेतला. (हे विठ्ठल कामत नव्हेत, गौतम कामत... हे त्यांचे कुणी आहेत का माहिती नाही...) जाताना एकदम ‘सरदारगृह’ ही पाटी बघितली आणि थबकलो. हे लोकमान्य टिळकांचं मुंबईतलं निवासस्थान. एक ऑगस्ट १९२० रोजी त्यांचं इथंच देहावसान झालं. आत्ता तिथं त्या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर पुढं आलेल्या छतावर त्यांचा अगदी छोटासा अर्धपुतळा बसवलेला दिसला. तो खालून नीट दिसतही नव्हता. समोरून फोटो काढायला गेलो, तर ‘स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ या ओळी आणि टिळकांची थोडी माहिती तिथं कोरलेली दिसली. तिथं फोटो काढले. त्या रस्त्यालाही ‘लोकमान्य टिळक मार्ग’ असंच नाव आहे. टिळक गेले तेव्हा त्यांची त्या काळातली सर्वांत मोठी अंत्ययात्रा मुंबईत तेव्हा निघाली होती. आचार्य अत्रे यांनी त्यांच्या शैलीत (बहुतेक ‘कऱ्हेचे पाणी’मध्ये) त्या अंत्ययात्रेचं (तेव्हा स्मशानयात्रा असा शब्द रूढ होता) भरपूर भावनिक वर्णन केलेलं आहे. गिरगाव चौपाटीवर तेव्हा टिळकांवर अंत्यसंस्कार झाले होते. आता तिथं त्यांचा पूर्णाकृती पुतळा बसवला आहे. (तो बघितल्यावर मला नेहमी अशोक नायगावकरांची ‘टिळक’ ही भन्नाट कविता आठवते.) मला त्या थोड्या क्षणांत हे सगळं आठवलं. टिळकांचा तो उपेक्षित पुतळा बघून जरा वाईट वाटलं. मनोमन नमस्कार केला आणि पुढं निघालो.
आम्ही तिथून गिरगाव चौपाटीला टॅक्सीनं गेलो. जाताना त्या खूप जुन्या फ्लायओव्हरवरून गेलो. मला कधीचं त्या फ्लायओव्हरवरून जायचं होतं. ते अखेर झालं. चौपाटी नेहमीसारखी होती. तिथं ते लोक बसायला चटया भाड्यानं देतात. तीस रुपयाला एक चटई वगैरे. एक जण असाच मागे लागला. तुम्हाला दोन चटया लागतील, म्हणू लागला. आम्हाला हसू आवरेना. त्या ‘चटई क्षेत्रा’वरून भरपूर जोकही करून झाले. मुंबईतली बिचारी प्रेमपाखरं (जागेअभावी) तिथं येऊन बिलगली होतीच. ते सगळं बघत (किंवा तिकडं दुर्लक्ष करतोय असं दाखवत) आम्ही तिथं बसून राहिलो. वृषाली पहिल्यांदा तिथं आली होती. तिला थोड्या वेळानं त्या उडत्या चटया असह्य व्हायला लागल्या आणि आम्ही शेवटी निघालो मग तिथून... चौपाटी म्हटल्यावर भेळ, पाणीपुरी, कुल्फी हे सगळं रीतीप्रमाणे झालं. आमचं हॉटेल तिथून अगदी जवळ होतं. मग त्या सुंदर रस्त्यावरून सगळी मुंबई बघत चालत जाऊ या, असं ठरलं. मात्र, थोड्याच वेळात आमचा भ्रमनिरास झाला. त्या सुंदर मरीन ड्राइव्ह रस्त्यावर चक्क खोदकाम सुरू होतं. कोस्टल रोडच्या कामासाठी ग्रेड सेपरेटरसारखं प्रचंड खणून ठेवलं होतं. ती खणाखणी बघून फार यातना झाल्या. तरीही तिथूनच शेवटी चालत, मरीन लाइन्स स्टेशन क्रॉस करून महर्षी कर्वे मार्गाला लागलो. जाताना एकदम एक स्मशानभूमी लागली. त्यावर ‘जगन्नाथ शंकरशेट स्मशानभूमी’ असं लिहिलं होतं. थोडं पुढं गेल्यावर एक चर्च लागलं. तिथं भिंतीवर बारीक अक्षरात सोनापूर चर्च असं लिहिलेलं मी वाचलं. मग एकदम डोक्यात प्रकाश पडला. मगाशी दिसलेली ती स्मशानभूमी म्हणजे ‘सोनापूर’च! अत्र्यांच्या पुस्तकात याचाही अनेकदा उल्लेख वाचला होता. (दुसऱ्या दिवशी लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे अंत्यसंस्कार याच स्मशानभूमीत झाल्याचं पेपरमध्ये वाचलं.)
साधारण दीड ते दोन किलोमीटर चालत आम्ही हॉटेलवर पोचलो. मुंबईत एरवी मला प्रचंड आणि सतत घाम येतो. या वेळ डिसेंबरमधल्या थंड वातावरणामुळं एवढं चालूनही मला फारसा घाम आला नाही आणि याचा मला प्रचंड आनंद झाला. कारण या कारणामुळं मी मुंबईत चालत सगळं बघायची इच्छा असूनही ते टाळायचो. आता मात्र मला घाम न आल्यानं फारच बरं वाटलं. मुंबईत चक्क थंडी वाजत होती. आमच्या ऑफिसमध्येही चक्कर मारायची माझी इच्छा होती. तेही अंतर असंच चालत जाण्यासारखं होतं. मी आमचे सहकारी राजीव काळे यांना मेसेजही केला. तेही ऑफिसमध्ये होते आणि आनंदानं ‘ये की’ म्हणाले. रात्रीचं सीएसटी स्टेशन बघण्याचं एक आकर्षण होतं. मात्र, हॉटेलवर गेल्यावर दिवसभराचा थकवा एकदम जाणवला आणि बाहेर पडायचा उत्साह मावळला. मग मी त्यांना येत नसल्याचं कळवून टाकलं.
मी मुंबईत एवढ्या वेळा येऊनही घारापुरी लेणी बघितली नव्हती. किंबहुना आम्हा चौघांपैकी कुणीच बघितली नव्हती. त्यामुळं दुसऱ्या दिवशी सकाळी तिकडं जायचं हे नक्की होतं. मग लवकर उठून खाली खाऊ गल्लीत फक्त चहा घेतला आणि थेट टॅक्सीनं ‘गेट ऑफ इंडिया’ला पोचलो. एवढ्या सकाळी इथं येण्याची माझी ही पहिली वेळ होती. लगेच बोटीची तिकिटं काढली आणि बहुतेक तिकडं जाणाऱ्या पहिल्याच बोटीत आम्ही बसलोही. हा साधारण एका तासाचा प्रवास आहे. घारापुरी बेट मुंबई आणि मुख्य भूभागाच्या (उरण वगैरे) यांच्या मधे असल्याने आपण पूर्वेकडे प्रवास करतो. (अनेक वर्षं माझी समजूत गेट वे ऑफ इंडिया हे पश्चिमेकडे तोंड करून असेल, अशी होती. फार नंतर कळलं, की ते पूर्वेकडे तोंड करून आहे.) हा सगळा समुद्राचा आत घुसलेला भाग आहे आणि हा समुद्र अतिशय प्रदूषित आहे. अतिशय मातकट, पिवळसर पाणी दिसतं. त्यात तो सीगल पक्ष्यांना वेफर्स, कुरकुरे खाऊ घालण्याचा कार्यक्रम बोट निघाल्याबरोबर सुरू झाला. अर्थात आम्हीही उत्साहानं त्यांना एक-दोन कुरकुरे टाकले आणि व्हिडिओही काढले. त्या सर्व समुद्रात प्लास्टिकचा भरपूर कचरा तरंगत असल्याचं दिसलं. सीगल पक्ष्यांना मात्र आता कुरकुरे किंवा वेफर्सची चांगलीच सवय झालेली दिसली. त्या समुद्रात जर खोलवर मोठमोठी मालवाहू जहाजं नांगरलेली दिसतात. ‘टग’ बोटींतून सामान उतरवण्याचं कामही अनेक ठिकाणी सुरू असलेलं दिसतं. जसजसं पुढं जाऊ तसं डाव्या बाजूला शिवडी ते न्हावाशेवा या समुद्री महामार्गाचं काम सुरू असलेलं दिसतं. हा महामार्ग अजून दोनेक वर्षांत तयार होईल आणि पुण्याहून दक्षिण मुंबई आणखी जवळ येईल. जवळपास ४०-५० मिनिटं प्रवास केल्यावर उजव्या बाजूला घारापुरी बेट दिसायला लागलं. माझ्या अपेक्षेपेक्षा हे बेट बरंच मोठं आणि डोंगरासारखं होतं. थोड्याच वेळात आमची बोट तिथल्या जेट्टीला लागली. आमची आजच्या दिवसातली पहिलीच प्रवासी बोट होती. आमच्या बोटीत जवळपास १०० लोक तरी असावेत. ते उतरल्याबरोबर तिथल्या सुस्त जीवनात त्या दिवसाची चहलपहल एकदम सुरू झाली. जेट्टीला लागूनच एक टॉय ट्रेन होती. ती चालण्याचं अंतर बऱ्यापैकी वाचवते. पण तेव्हा ती बंद होती. मग आम्ही चालत पुढं गेलो. अगदी सुरुवातीपासून खाण्याचे स्टॉल, दुकानं यांची रेलचेल दिसली. आम्ही एके ठिकाणी थांबून गरमागरम वडापाव, मॅगी, चहा यांचा आस्वाद घेतला. पुढं घारापुरी ग्रामपंचायतीची पाच-पाच रुपयांची एंट्री फी भरून आत शिरलो. साधारण पर्वतीएवढ्या उंचीवर दगडी पायऱ्यांनी वर जायचं होतं. दोन्ही बाजूंनी सलग दुकानं व हॉटेलं होती. त्यांनी ताडपत्र्या टाकून तो सगळा पायऱ्यांचा मार्ग झाकला होता, हे एक बरं झालं. त्यामुळं ऊन लागत नव्हतं. आम्ही रमत-गमत, आजूबाजूचे स्टॉल बघत वर चढतो. नाही म्हटलं तरी थोडी दमछाक झाली. मात्र, वर पोचल्यावर सगळा शीण नाहीसा झाला. गार वारा आणि मागे बघावं तर दूरवर समुद्रच समुद्र असं ते दृश्य फार छान होतं. 

वर गेल्यावर एंट्री फी भरली. आता तिथं बऱ्यापैकी सौंदर्यीकरणाचं काम सुरू आहे. पहिल्याच लेण्यात ती प्रसिद्ध शिवमुद्रा (तीन चेहऱ्यांची) आहे. हे पहिलंच लेणं अद्भुत आहे. अनेक मूर्तींची मोडतोड झालेली आहे. पोर्तुगीजांनी या पाषाणशिल्पांवर गोळीबाराचा सराव केला, असं एक गाइड सांगताना ऐकलं. फार चीड आली... आता या वास्तूला हेरिटेज वास्तूचा दर्जा मिळाला आहे. तिथं बराच वेळ रेंगाळलो. जपानी, कोरियन पर्यटक बरेच दिसले. तिथं माकडंही बरीच होती. तिथं फिरताना एकूण फार शांत वाटलं. पुढेही काही लेणी होत्या. पण पहिल्या लेण्याची सर कुणाला नव्हती. थोड्या वेळानं खाली उतरलो. पायऱ्या उतरताना लागलेल्या एका हॉटेलातच जेवलो. परत येताना मात्र टॉय ट्रेन मिळाली. पाच रुपयांचं तिकीट काढून जेट्टीवर आलो. लगेच बोट मिळाली. जाताना उत्साहात असलेली सगळी मंडळी येताना मात्र डुलक्या काढत होती. जरा ऊनही वाढलं होतं. समुद्राचा पृष्ठभाग सोनेरी रंगानं चमचमत होता. आता एलिफंटाकडे जाणाऱ्या बऱ्याच बोटी दिसत होत्या. हळूहळू ‘गेट वे ऑफ इंडिया’ दिसू लागलं. तासाभरात आम्ही परत इकडे येऊन पोचलो. 
यानंतर जवळपास भटकंती करायची होती. ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ला (एनजीएमए) जायचं ठरवलं. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (रिगल चौक) भव्य आहे. इथं लालबहादूर शास्त्रींचा पुतळा आधीपासून होता. आता बाळासाहेब ठाकरेंचाही पूर्णाकृती पुतळा इथं उभारला आहे. तिसऱ्या आयलंडमध्ये ‘विक्रांत’ या आपल्या पहिल्या विमानवाहू नौकेची भलीमोठी प्रतिकृती ठेवली आहे. तो एक सेल्फी पॉइंटच झाला आहे. ‘एनजीएमए’ बंद होतं. मग म्युझियमवरून जाताना बरीच गर्दी दिसली. कदाचित शाळांची सहल किंवा कुठला तरी कार्यक्रम असावा. त्यामुळं मग म्युझियममध्ये शिरण्याचा मोह टाळला. पुढं ‘जहांगीर’मध्ये मात्र गेलो. तिन्ही प्रदर्शनं बघितली. त्यातलं शहरांवरचं प्रदर्शन मला विशेष आवडलं. तिथं रस्त्यावरच अनेक जण आपली चित्रं लावतात, तेही मला आवडतं. ती चित्रं बघत बराच टाइमपास केला. तिथं रस्त्यावर चहा विकणाऱ्याकडून चहाही घेतला. आता साडेचार वाजत आले होते. मग नरीमन पॉइंटला जायचं ठरवलं. मला खरं तर ‘बेस्ट’ बसनी जायचं होतं. त्यातही डबल डेकरनं! मात्र, त्या रूटवर तशी एकही डबल डेकर नव्हती. मग शेवटी टॅक्सी करून नरीमन पॉइंट गाठला. टॅक्सीवाल्यानं अगदी ‘एनसीपीए’च्या (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स) वास्तूसमोर सोडलं. एनसीपीएची वास्तू बघताच मला विलक्षण आनंद झाला. कारण हेदेखील बऱ्याच वर्षांचं बघायचं राहिलं होतं. आम्ही अर्थात समोर कठड्यावर जाऊन बसलो. शनिवारची संध्याकाळ असल्यानं थोड्याच वेळात गर्दी वाढली. इथून सूर्यास्ताचा अप्रतिम ‘शो’ बघितला. भेळ खाणं, चहा-कॉफी हे जोडीनं झालंच. त्या गर्दीतही खूप शांत वाटत होतं हे नक्की!
सूर्यास्त झाल्यावर तिथून निघालो. मला ‘एनसीपीए’ आतून बघायचं होतं. मला आठवतंय तसं १९८५ की ८६ मध्ये पु. ल. या संस्थेचे संचालक झाले, तेव्हापासून मला या संस्थेचं नाव माहिती आहे. मात्र, ती बघण्याचा योग आज येत होता. इथल्या टाटा थिएटरचीही खूप ख्याती ऐकली होती. आम्ही शनिवारी गेलो, तेव्हा संध्याकाळी साडेसहा वाजता तिथल्या भाभा थिएटरमध्ये उस्ताद झाकिर हुसेन व सतारवादक नीलाद्रीकुमार यांचा कार्यक्रम होता. सहज ‘बुक माय शो’वर पाहिलं. तर आठशे रुपयांपासून तिकिटं होती. अर्थात ‘सोल्ड आउट’ होती. तरी सहज आत जाऊन थिएटरच्या दारात उभे राहिलो. मुंबईतले ‘हूज हू’ म्हणावेत असे लोक आलिशान गाड्यांमधून येऊ लागले. मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जग्वार अशा सगळ्या गाड्या... कुणी तरी सेलिब्रिटी किंवा ओळखीचं कुणी भेटेल, असं उगाच वाटत होतं. पण तसं काही घडलं नाही. 

हळूहळू पूर्ण अंधार झाला आणि मुंबई उजळू लागली. कितीदाही हे झगमगीत रूप बघितलं तरी कंटाळा येत नाही. मला तर व्हिक्टोरियाची सैर करायचाही मोह झाला होता. पण बऱ्याचशा बग्ग्या आता इलेक्ट्रिक ऑपरेटेड झालेल्या दिसल्या. त्यात काही ती गंमत नाही. आम्हाला डिनर ‘कॅफे माँडेगर’मध्ये करायचं होतं. (तेही एक छोटंसं स्वप्न!) मग पुन्हा टॅक्सी करून तिकडं... तिथं ‘वैशाली’समोर असते तशी रांग होती. पण आम्हाला तिथंच जायचं होतं आणि काहीही घाई नव्हती. मग दहा-पंधरा मिनिटांत आत शिरलो. एकदम आत ‘इनसाइड स्टोरीज’मध्ये जागा मिळाली. तिथली ती चित्रं (मिरांडाची असावीत का?), ते म्युझिक, ते लाल ड्रेसवाले आणि अगदी लागून-लागून असलेल्या खुर्च्यांमधून सराईतपणे सर्व्ह करणारे वेटर असा तो एक भारी माहौल होता. इथं शांतपणे (मुंबईच्या तुलनेत) खाणं-पिणं झालं. मन तृप्त झालं. शांतपणे तिथून निघालो. खरं तर रात्री त्या भागातून आणखी चालत फिरायची माझी इच्छा होती. पण शेवटी आम्ही टॅक्सी करून हॉटेलवर परतलो.
दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी हॉटेल सोडलं. रविवारची सकाळ. तिथंच शेजारी ब्रेकफास्ट केला. मी तिथून जी गाडी सोडली ती तीन तासांत थेट घराच्या पार्किंगमध्येच थांबवली. कधी घरी पोचलो ते कळलंही नाही. मधे टोलव्यतिरिक्त कुठेही थांबलो नाही, थांबावंंसं वाटलंही नाही. घराची ओढ तीव्र असतेच! 
आपल्या अगदी रूटीन, व्यग्र दिनक्रमात थोडा ब्रेक गरजेचाच असतो. आम्ही तो पुरेपूर घेतला. दमणला दोन दिवस अगदी वेगळ्या वातावरणात आणि दक्षिण मुंबईत पहिल्यांदाच हॉटेलमध्ये मुक्काम करून वेगळी मुंबई अनुभवली. लक्षात राहिली ती दमणची असीम शांतता आणि मुंबईतल्या गर्दीतही जपता आलेला आपला खासगीपणा... मुंबई शहर मला आवडतं ते यासाठी! 

(उत्तरार्ध)

----

12 Dec 2022

दमण-मुंबई डायरी - पूर्वार्ध

हा सागरी किनारा...
------------------------


कोव्हिडपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये आपल्याकडे जो उठत होता, तो हंपीला जात होता. सोशल मीडियावर हंपीवाल्यांचे फोटो बघून मला न्यूनगंड आला आणि मी तशी पोस्टही टाकली. त्या वर्षी मला हंपीला जायला काही जमलं नाही आणि नंतरची दोन वर्षं तर शक्यच नव्हतं. म्हणून यंदाच्या डिसेंबरमध्ये पहिली संधी मिळताच हंपीला जाण्याचं निश्चित करून टाकलं. माझ्यासह धनश्री, माझा आतेभाऊ साईनाथ आणि त्याची बायको वृषाली असे आम्ही चौघं जाणार होतो. अगदी हॉटेल बुकिंग वगैरे पण केलं होतं. मात्र, अचानक सीमाप्रश्न भडकला आणि जरा काळजी वाटायला लागली. आम्ही आमची कार घेऊन जाणार होतो आणि बेळगावात मुक्काम करून पुढं जायचा विचार होता. पण मग एकूण चिघळती परिस्थिती पाहता दोन दिवस आधी हंपीला जाणं जड अंत:करणानं रद्द करून टाकलं. अर्थात रजा होती, त्यामुळं कुठं तरी जायचं हे ठरलं होतंच. मग स्वाभाविक पर्याय आले ते गोवा किंवा कोकण हेच. मात्र, इथली बहुतेक ठिकाणं बघून झाली होती आणि डिसेंबरमध्ये कोकणात एकूणच हॉटेलांपासून सर्वच सेवा महाग मिळतात आणि कदाचित निकृष्टही! म्हणून मग ते पर्याय बाद झाला. अजून बघितलं नाही अशा ठिकाणी जाऊ या यावर आमचं चौघांचं एकमत झालं होतं. मी मनातल्या मनात महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा नकाशा आणला आणि कोकणातून वर वर जाऊ लागलो. डहाणूच्या परिसरात कुठं तरी जावं असं वाटू लागलं. आणि अचानक डोळ्यांसमोर नाव आलं ते दमणचं. दीव, दमण आणि दादरा-नगर-हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहेत, एवढंच शाळेत शिकलेलो. त्यापलीकडं दमणविषयी फारशी माहिती नव्हती. तिथं समुद्रकिनारा आहे आणि तिथंही पोर्तुगीजांची राजवट होती, म्हणजे गोव्यासारखंच वातावरण असेल असा एक अंदाज होता. याशिवाय दारूबंदी असलेल्या गुजरातमधले अनेक मद्यप्रेमी लोक खास मद्यपानासाठी दमण आणि सिल्व्हासाला येतात, हे ऐकून माहिती होतं. हंपीच्या तुलनेत (पुण्याहून ५६५ किलोमीटर) दमणचं अंतरही (३१३ किमी) पुष्कळ कमी होतं. मुंबईवरून जावं-यावं लागणार होतं, त्यामुळं मुंबईला जाण्याची संधी मी सोडणं शक्यच नव्हतं. शेवटी दमणला दोन दिवस आणि मुंबईत दोन दिवस राहू या, असं ठरवलं आणि तशी हॉटेलची बुकिंग करून टाकली. 
बुधवारी (७ डिसेंबर) दत्तजयंतीच्या शुभमुहूर्तावर सकाळी आठ वाजता आम्ही दमणच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं. ‘श्री दत्त’मध्ये ब्रेकफास्ट करणं आलंच. दत्तजयंती आणि ‘श्री दत्त’ आणि मी श्रीपाद यावर माफक विनोदही करून झाले. तिथं झकास थालिपीठं आणि सुंदर दही मिळाल्यानं मजा आली. चहा घेतला आणि गाडी पुढं दामटली. ठाण्यात शिरल्यावर ट्रॅफिक जॅम लागेल हा अंदाज होताच आणि तसंच झालं. एके ठिकाणी मी सुकाणू साईनाथकडं दिलं आणि वाढत्या ठाण्याच्या विस्ताराकडं डोळे विस्फारून बघू लागलो. मी ठाण्यापर्यंत आलो असलो, तरी इथून पुढचा प्रदेश मला नवा होता. कार घेऊन दिवसा प्रवास करण्यामागे तो प्रदेश बघण्याचा उद्देश होताच. मला स्वत:ला रात्री प्रवास करायला आवडत नाही, ते यासाठीच! ठाण्याच्या बाहेर पडल्यावर टोपोग्राफी एकदम बदलते. डोंगर लागतात. जरासे मातकट आणि धूळभरले! मालवाहू ट्रकची संख्या प्रचंड आणि तुलनेनं रस्ता खराब. वसईच्या खाडीपर्यंत हेच सुरू राहिलं. मुंबईकडून येणारा रस्ता आणि ठाण्याहून येणारा रस्ता जिथं एकत्र मिळतात, तिथं फ्लायओव्हरचं काम सुरू आहे. त्यामुळं हे ट्रॅफिक जॅम होत असल्याचं आम्हाला तिथं पोचल्यावर कळलं. हळूहळू गर्दीतून ती खाडी ओलांडून आम्ही मुंबई-अहमदाबाद महामार्गाला लागलो आणि दमणुकीमुळं लगेच आलेल्या पहिल्याच हॉटेलमध्ये जेवायला थांबलो. काठियावाडी असं नाव असलेल्या त्या हॉटेलात गुजराती पद्धतीचं जेवलो. आम्ही अजून महाराष्ट्रातच असलो, तरी गुजरातचा प्रभाव आजूबाजूच्या हॉटेलांवर दिसू लागला होता. अगदी गुजराती पाट्याही इथूनच सुरू झाल्या. मुंबई-अहमदाबाद रस्ता काही ठिकाणी खराब असला, तरी बराचसा चांगला आहे आणि सहा लेनचा आहे. त्यामुळं इथून पुढं साईनाथनं गाडी सुसाट दामटली. महाराष्ट्राची हद्द बरीच पुढपर्यंत आहे. तलासरी हे मोठं गाव या महामार्गावर लागतं. (माझा ओक वाड्यातला एक मित्र या गावचा. त्याची आठवण आली...) त्यानंतर गुजरात-महाराष्ट्र राज्यांच्या चेकपोस्ट. त्यानंतर अच्छाड हे महाराष्ट्राच्या हद्दीतलं शेवटचं गाव. तिथून पुढे अगदी २०-२५ किलोमीटरवर वापी आहे. दमण हे समुद्रकिनाऱ्यावर असल्यानं १६ किलोमीटर आत डावीकडे आहे. थोड्याच वेळात तो फाटा आला. तिथं लगेच एक रेल्वे क्रॉसिंग लागलं. ते ओलांडून पुढं गेल्यावर दमणचा रस्ता लागला. दमण या केंद्रशासित प्रदेशाची हद्द अगदी पाच किलोमीटर अलीकडं सुरू होते. तो फलक आला आणि एकदम खराब रस्ता लागला. केंद्रशासित प्रदेशाची ही परवड बघून जरा धक्काच बसला. मात्र, पुढं सगळीकडं चांगले रस्ते लागले.

दुपारी चारच्या सुमारास, आठ तासांच्या प्रवासानंतर आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोचलो. हॉटेलच्या परिसरात अजिबात घरं किंवा वर्दळ नव्हती. हे दमण नव्हतंच. दमणच्या जवळ असणारं परियारी नावाचं गाव होतं. त्या गावात आमचं हॉटेल होतं, हे नंतर आम्हाला कळलंच. जांपोर नावाचा इथला बीच आमच्या हॉटेलपासून अगदीच जवळ होता. मग संध्याकाळी तिथं गेलो. समुद्र पुष्कळच आत गेला होता. पौर्णिमा आणि त्यात ओहोटी... मात्र, एवढा आत गेलेला आणि कमालीचा शांत समुद्र मी पहिल्यांदाच बघत होतो. इथले बीच ‘मडी’ (चिखलयुक्त) आहेत, ही माहिती आधी समजली होतीच. त्यामुळं इथं गर्दीही जरा कमी होती. आमची थोडी निराशाच झाली तो बीच बघून... मात्र, बीचलगत बांधलेला रस्ता आणि तिथं उभारलेले दिव्यांचे खांब अगदी आकर्षक होते. इथं एवढी कमी गर्दी बघून आम्हाला खरं तर कसं तरीच होत होतं. आपल्या इथं प्रत्येक पर्यटनस्थळी एवढी गर्दी असते, की बस! त्या तुलनेत इथं गर्दी होती, पण ती फारच किरकोळ! आमच्याकडं गाडी असल्यानं आम्ही तो परिसर जरा पिंजून काढावा म्हणून निघालो. त्या बीचच्या कडेनं केलेल्या सुंदर रस्त्यानं दोन-अडीच किलोमीटर गेल्यावर आम्हाला ‘नानी दमणकडे’ अशी पाटी दिसली. आम्ही लगेच तिकडं गाडी वळवली. थोड्याच वेळात एकदम मोठं गाव लागलं. पेट्रोलपंप, मोठमोठी दुकानं, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि जरा रहदारी हे बघितल्यावर जरा जीवात जीव आला. दमणचे दोन भाग आहेत. एक नानी (म्हणजे छोटं) दमण आणि एक मोटी (म्हणजे मोठं) दमण. यात गंमत अशी, की प्रत्यक्षात नानी दमण हे मोठं आहे आणि मोटी दमण लहान. अर्थात मोटी दमणकडं असलेली एक भव्य गोष्ट लवकरच आम्हाला दिसणार होती. आम्ही त्या रस्त्यानं जरा पुढं गेलो तर एक भव्य, दगडी, आडवी भिंत लागली. एखाद्या धरणाची असावी अशी ती महाकाय भिंत कशाची असावी, याचा विचार करू लागलो तोच दिसलं, की हा तर दमणचा प्रसिद्ध सेंट जेरोम किल्ला आहे. आम्ही लगेच गाडी त्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत घेतली. समोरच एक रणगाडा ठेवलेला होता. किल्ल्याच्या भिंतीवर तीव्र प्रकाशझोत सोडले होते. सभोवती नीट राखलेली हिरवळ होती. आम्ही तिथं भरपूर फोटो काढून घेतले. किल्ल्याच्या भोवती एक चक्कर टाकली. या किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचं काम २०१९ मध्ये झाल्याचा फलक तिथं लावला आहे. किल्ल्याच्या आत दमण नगर परिषदेचं कार्यालय आणि इतर सरकारी कार्यालयं आहेत. अगदी शेवटी गेल्यावर दीपगृहाकडं जाणारा रस्ता दिसला. मात्र, संध्याकाळ झाल्यामुळं तिथला प्रवेश बंद झाला होता. आम्ही तिथून परत फिरलो. पुढं जाऊन डावीकडं वळलो तर दमणगंगेवरचा पूल लागला. या नदीमुळंच दमणचे हे दोन भाग पडले आहेत. समुद्राच्या मुखाजवळचा भाग असल्यानं नदीत भरपूर पाणी होतं. हा पूल ओलांडून पुढं गेल्यावर नानी दमणमध्ये जरा फिरलो. तिथंच एक कुट्टी नावाचं दाक्षिणात्य रेस्टॉरंट होतं. तिथं चांगलं जेवण मिळालं. रात्री रमतगमत हॉटेलवर आलो. तोवर भरपूर गाड्या येऊन पार्क झालेल्या दिसल्या. एकूण परियारीतलं आमचं हे हॉटेल बरंच लोकप्रिय असावं असा अंदाज आला. हॉटेल चांगलंच होतं. रात्री तिथल्या हिरवळीवर गप्पा मारत बसलो. 
दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्याच हॉटेलमधला काँटिनेंटल ब्रेकफास्ट घेतला. बाहेर पडल्यानंतर आधी देवका बीचला जायचं ठरवलं. तो बराच दूर होता. पण तिथं गेल्यावर बरंच नवं काम सुरू असलेला कोस्टल रोड दिसला. पण तो स्पॉट इतका भारी होता, की फोटोशूटला पर्याय नव्हताच. मग रील्स, फोटोशूट असं सारं साग्रसंगीत भर उन्हाचं करून झाल्यावर तिथून जवळच असलेल्या मीरासोल गार्डन या ठिकाणी गेलो. 

आपल्या सारसबागेसारखं, पण जरा छोटं असं हे ठिकाण आहे. एक सुंदर तळं आणि मधोमध रेस्टॉरंट अशी रचना आहे. तिथं बोटिंग, टॉय ट्रेन पण होत्या. आम्ही तिथं पेडल बोटिंग केलं. भर दुपारी त्या तळ्यात हे बोटिंग करणारे आम्हीच (वेडे) होतो. पण २० मिनिटं पेडलिंग करून व्यायामही झाला आणि मजाही आली. मग तिथंही भरपूर फोटो झाले. त्याच कोस्टल रोडवरून येताना समुद्राला भरती आलेली दिसली आणि आमच्याही आनंदाला भरती आली. आता समुद्र बीचच्या पुष्कळ जवळ आला होता. आम्ही एके ठिकाणी गाडी थांबवली आणि तिथं जाऊन एकदाचे पाय भिजवले. नंतर तो रस्ता संपेपर्यंत प्रवास केला आणि डाव्या बाजूला एकदम एक छोटा, गढीसारखा किल्ला दिसला. हा नानी दमण फोर्ट. मग तिथं गाडी लावून आत गेलो. आत एक चर्च आहे. एका शाळेचा काही तरी कार्यक्रम होता, त्याची तयारी सुरू होती. आम्ही त्या किल्ल्याच्या बुरुजांवरून चारी बाजूंनी एक चक्कर मारली. आता उन्ह जाणवत होतं. भूकही लागली होती. मग बाजारपेठेत जरा चौकशी करून एका हॉटेलात गेलो. तिथं गुजराती थाळीची ऑर्डर दिली. भूक लागल्यामुळं आम्ही चौघंही त्या थाळीवर तुटून पडलो. मस्त जेवण झालं. तिथून मग पुन्हा त्या मोठ्या किल्ल्यात दीपगृह बघायला गेलो. चार-सव्वाचार वाजले होते. दीपगृहाच्या इथं जरा गर्दी दिसली. तिथून समोरच नानी दमणचा बीच दिसला. हा बीच अधिक देखणा दिसत होता. तिथं वॉटरस्पोर्ट आणि इतर ॲक्टिव्हिटी पण सुरू असलेल्या दिसल्या. गर्दीही होती. मग तिथून उतरून थेट त्या बीचवरच गेलो. इथल्या बीचवर बारीक वाळू होती. तिथंच बसलो. समोर बरेच लोक वॉटर स्पोर्टचा आनंद लुटत होते. हा बीच जरा इतर बीचसारखा गजबजलेला वाटला. समोरच एक मीरा कॅफे नावाचं हॉटेल होतं. तिथं फार सुंदर चहा मिळाला. मग आम्ही संपूर्ण संध्याकाळ तिथंच रेंगाळलो. अंधार पडल्यावर मग पुन्हा कार काढून त्या संपूर्ण कोस्टल रोडनं आम्ही राहत होतो त्या जांपोर बीचपर्यंत चक्कर मारली.
आता त्या गावाचा आकार-उकार मला जरा समजायला लागला होता. पुन्हा सावकाश गाडी चालवत इकडे आलो. मीरा कॅफेमध्येच निवांत जेवलो. तिथं आमच्याशिवाय कोणीही नव्हतं. नंतर एक-दोन फॅमिली आल्या. एवढी असीम शांतता, समोर सुंदर झगमगता रस्ता, तिथं स्केट करणारे, चित्रं काढणारे लोक... काही क्षण एकदम परदेशात आल्यासारखंच वाटलं. एकदम लक्षात आलं, की आपल्याला हवंय ते हे! शांतता... मायेनं थोपटणाऱ्या आईच्या हातासारखी शांतता... जवळच्या माणसाच्या मिठीच्या ऊबेत मनाला लाभते ती असीम शांतता.... आमचं बोलणं, गप्पा, बडबड एकदम कमी कमी होत गेलं... आम्ही ती शांतता स्वत:त मुरवत स्वस्थ बसून राहिलो. त्या बीचवर रस्त्याच्या कडेने फूटपाथ आणि बसायला कठडे केले आहेत. किती तरी वेळ तिथं बसलो. मागून समुद्रावरून येणारं थंडगार वारं, समोर दीपगृहाचे फिरणारे दिवे आणि आकाशात पौर्णिमेचा पूर्ण चंद्र! अहाहा... ते सगळे क्षण मनाच्या कुपीत अत्तरासारखे घट्ट बंद करून ठेवले.
जेवण झाल्यावर सावकाश हॉटेलकडं निघालो... मन समाधानानं, आनंदानं भरून आलं होतं... दुसऱ्या दिवशी इथं आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं.... आता काही बघण्याची असोशी उरली नव्हती की कुठेही घाई-गर्दीत टिकमार्क करत जायचं नव्हतं... दमणनं जे काही द्यायला हवं होतं ते दिलं होतं... 



(पूर्वार्ध)

---

उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

16 Nov 2022

रोहन मैफल - ‘पेन’गोष्टी - भाग ७ व ८

भाग ७
--------

साहित्यानंद वर्धिष्णू होवो...
--------------------------------

आगामी ९६ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्याला होणार आहे, यावर साहित्य महामंडळानं अखेर शिक्कामोर्तब केलं. साहित्य महामंडळाचं मुख्यालय आता मुंबईकडं आलं आहे आणि आता पुढली तीन वर्षं उषा तांबे मॅडम यांच्याकडं मराठी साहित्याचं कुलमुखत्यारपत्र असणार आहे. साधारणत: ज्या विभागीय साहित्य परिषदेकडं महामंडळाचं अध्यक्षपद असतं, ती परिषद आपल्या भौगोलिक कार्यक्षेत्रात साहित्य संमेलन भरविण्यासाठी आग्रही असते आणि ते रास्तही आहे. त्या हिशेबानं आता मुंबई-ठाणे किंवा कोकणात संमेलन व्हायला हवं होतं. मात्र, तसं न होता, ते एकदम विदर्भात गेलं. याचं कारण विदर्भ साहित्य संघाची शताब्दी होय. विदर्भ साहित्य संघ ही केवळ नागपूर किंवा विदर्भच नव्हे, तर अखिल महाराष्ट्रातील एक प्रमुख आणि जुनी अशी साहित्य संस्था होय. अशा संस्थेची शताब्दी असताना त्यानिमित्ताने आम्हाला संमेलन भरवू द्यावं, अशी आग्रही मागणी वि. सा. संघानं महामंडळाकडं केली होती. महामंडळाचं मुख्यालय मराठवाड्याकडं, म्हणजेच कौतिकराव ठाले पाटलांकडं असतानाच ही मागणी आली होती आणि महामंडळानं या मागणीला तत्त्वत: होकारही दिला होता. त्यानुसार आता हे संमेलन वर्ध्याला (किंवा वैदर्भीय मंडळींच्या भाषेत वर्धेला) होणार आहे. कौतिकरावांना उदगीरला त्यांच्या कार्यकाळातलं अखेरचं संमेलन घेता यावं, म्हणून साहित्य महामंडळाचं मुख्यालय एक महिना अतिरिक्त काळासाठी मराठवाड्याकडं राहिलं. तांबे मॅडमनी तिथंही समजूतदारपणा दाखवला. आता महामंडळानं आधीच्या कार्यकाळात दिलेला शब्द पाळून तांबे मॅडमनी आपला समजूतदारपणा द्विगुणित केला आहे. आता विदर्भ साहित्य संघाचं आदरातिथ्य अनुभवण्याची संधी संपूर्ण राज्यभरातील साहित्यरसिकांना मिळणार आहे.
वर्धा म्हटलं, की आम्हाला आणि (बहुतेक विदर्भेतर रहिवाशांना) सेवाग्राम आठवतं. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या पावनस्पर्शानं पुनीत झालेल्या या भूमीत होणाऱ्या साहित्य संमेलनाचं अध्यक्ष कोण असणार, याबाबत आता उत्सुकता आहे. विदर्भ साहित्य संघाच्या मनात (आणि अर्थात तांबेबाईंच्या) कोण आहे, यावर सगळं अवलंबून आहे. हे संमेलन जानेवारीत ठेवलंय, ते एक बरं झालं. विदर्भात जाण्यासाठी हिवाळा हाच योग्य ऋतू आहे. विदर्भातलं आदरातिथ्य जोरदार असलं, तरी वर्धा हा सेवाग्राममुळं (तहहयात) दारूबंदी असलेला जिल्हा आहे, याचंही भान साहित्यरसिकांनी ठेवलेलं बरं! अर्थात, साहित्यिक असोत वा साधे रसिक; मैफल रंगवायची तर ते कशीही रंगवू शकतात यात वाद नाही. मात्र, अट्टल रसिकांचे जरा हालच होतील, हे खरं! एकूण मजा येणार आहे.
वर्ध्याला होणारं साहित्य संमेलन हे ९६ वं असणार आहे. याचा अर्थ ९७ व ९८ वं साहित्य संमेलनही मुंबईकडे महामंडळाचं मुख्यालय असताना होईल. त्यानंतरची तीन वर्षं हे मुख्यालया पुण्याकडं असणार आहे. म्हणजेच ९९, १०० व १०१ अशी तीन अत्यंत महत्त्वाची व मानाची संमेलनं भरविण्याचा मान पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेला मिळणार आहे. कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या डोक्यात हे सगळं असणारच. पुण्याच्या ‘मसाप’च्या ऐतिहासिक माधवराव पटवर्धन सभागृहाचं नूतनीकरण करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आहे. ते काम जवळपास पूर्ण झालं असून, मसापचा हा नवा हॉल अत्याधुनिक स्वरूपात रसिकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही वर्षांत हे काम होणं आवश्यक होतं, ते अखेर झालं आहे. ‘मसाप’च्या त्या ऐतिहासिक सभागृहानं किती तरी साहित्यिक कार्यक्रम बघितले. किती तरी वाद-चर्चा झडल्या. तिथल्या भिंतींवर टांगलेले आतापर्यंतच्या सर्व संमेलनाध्यक्षांचे फोटो त्याचे कायमचे साक्षीदार आहेत. मात्र, त्या छोट्या हॉलची प्रेक्षकसंख्या अगदीच मर्यादित असायची. (जवळपास रोज संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमांना तेवढीही गर्दी नसायची तो भाग वेगळा!) मात्र, काहीही असो, पुण्यातल्या साहित्य रसिकांच्या मनात या वास्तूचं आणि या सभागृहाचं स्थान कायमच प्रेमाचं राहील, यात शंका नाही. आता तो सर्व इतिहास झाला. इमारतीच्या नूतनीकरणासोबतच आणखी काय काय आणि कशाकशाचं नूतनीकरण प्रा. जोशी आणि त्यांची कार्यकारिणी करते हे बघायचं.
‘मसाप’तर्फे दोन वर्षं करोनामुळं लांबणीवर पडलेले साहित्य पुरस्कार मागच्या आठवड्यात पुण्यात समारंभपूर्वक देण्यात आले. ज्येष्ठ हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलं होतं. ‘व्यवस्थेला प्रश्न विचारणे हे साहित्यिकांचे काम’ अशा अर्थाचे भाषण वाजपेयी यांनी या वेळी केलं.  आपले संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांनीही आपल्या भाषणातून नेमके असेच विचार मांडले होते. वाजपेयी यांनी जवळपास तेच मुद्दे पुन्हा अधोरेखित केले. या सोहळ्यात ज्येष्ठ विज्ञान लेखक निरंजन घाटे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, हा सर्वांत छान क्षण होता. घाटे गेली कित्येक वर्षं निरलसपणे आणि निष्ठेनं विपुल लेखन करीत आले आहेत. त्यांच्याइतका बहुप्रसवा लेखक अलीकडच्या काळात सापडणं कठीण. त्यांच्या साहित्यसेवेचा यथोचित गौरव झाला, अशीच भावना उपस्थित रसिकांची होती. बाकी मसापचे इतर वार्षिक पुरस्कार दोन वर्षांचे मिळून देण्यात आल्यानं आता साहित्यशारदेचा दरबार पुन्हा गजबजल्यासारखा वाटतो आहे. मसापतर्फे २० ते २५ प्रकारचे विविध पुरस्कार वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील सर्वोत्कृष्ट साहित्यासाठी दिले जातात. हे पुरस्कार मानाचे असले तरी पुरस्कारार्थींना अधिक रक्कम मिळायला हवी. त्यासाठी रसिक दात्यांनी पुरस्कर्ते म्हणून पुढं यायची आवश्यकता आहे. तसं झालं तर पुरस्कार घेणाऱ्या साहित्यिकांनाही हुरूप येईल.
करोनाकाळानं जवळपास दोन वर्षं थंडावलेल्या साहित्य व्यवहारानं आता पुन्हा जोर धरला आहे. गेल्या आठवड्यात लोकप्रिय लेखिका सुधा मूर्ती याही पुण्यात होत्या. त्यांच्या कार्यक्रमाला लोटलेली तुफान गर्दी ‘चांगल्या साहित्याला व चांगल्या लेखकाला मरण नाही आणि पर्यायही नाही,‘ हेच पुन:पुन्हा अधोरेखित करत होती. हा साहित्यानंद वर्धिष्णू होवो, हीच वर्ध्याच्या संमेलन घोषणेप्रसंगी ईश्वराकडे प्रार्थना!

(२९ मे २०२२)

---

भाग ८
---------

कलेचा आस्वाद कसा घ्यावा?
-----------------------------------

पुण्यात वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग कायम सुरू असतात. जपानी केशरचनेपासून ते आफ्रिकन वेषभूषेपर्यंत, काश्मिरी खाद्यपदार्थांपासून ते केेरळच्या आरोग्यप्रसाधनापर्यंत आणि गच्चीतल्या बागेपासून ते घोड्यांच्या पागेपर्यंत सगळ्या गोष्टींचे ‘क्लास’ इथं घेतले जातात. मात्र, सध्या ‘कलेचा आस्वाद कसा घ्यावा?’ हा वर्ग घेण्याची नितांत आवश्यकता आहे.
ग्रंथालयांत पुस्तकांची काळजी कशी घ्यावी, याबाबत हजारेक सूचना लिहिलेल्या असतात. तरीही पुस्तकांचे कोपरे दुमडणं, पुस्तकांची पानं फाडणं, मजकुरावर खुणा करणं, लेखकाला वाह्यात सूचना करणं असले प्रकार सुरूच असतात. तीच प्रथा सिनेमा आणि नाटकं बघतानाही बहुसंख्य प्रेक्षकांनी जारी ठेवली आहे. पॉपकॉर्नसह इतर अनेक आवाज करणारे पदार्थ खाणं, समोरच्या खुर्चीवर पाय ठेवणं, ते नाही जमलं तर समोरच्या खुर्चीला खटक खटक पाय मारणं, सोबत आलेल्या माणसासोबत अखंड गप्पा मारणं, मोबाइल काढून सतत मेसेज चेक करणं किंवा आलेला प्रत्येक फोन घेऊन मोठ्या आवाजात बोलणं... एक ना दोन! हे सर्व प्रकार करताना आपण काही चुकीचं करतो आहोत, याची कसलीही जाणीव या निरागस जीवांना नसते.
हल्ली हा अनुभव वारंवार यायला लागला आहे. नाट्यगृहांत, चित्रपटगृहांत, शास्त्रीय संगीताच्या मैफलीत किंवा अगदी चित्रप्रदर्शनांतही! आपल्याला एकाग्रपणे कुठल्याही कलाकृतीचा आस्वाद घेताच येणार नाही, याबद्दल प्रेक्षकांची आता खात्री पटत चालली आहे. महत्त्वाचं कारण अर्थातच आपल्या हातात आलेला मोबाइल नावाचा उपद्रव. वेळी-अवेळी वाजणाऱ्या मोबाइलच्या रिंगमुळे या सर्व ठिकाणी आपल्याला त्रास होऊ लागला आहे. प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी मोबाइल ‘सायलेंट मोड’वर टाकण्याची सूचना दिली जाते. मात्र, ती काही जणांना समजत तरी नाही किंवा ते दुर्लक्ष तरी करतात. असे लोक थोडेच असतात हे खरंय; पण त्यांच्यामुळं होणारा उपद्रव मात्र सगळ्यांना सहन करावा लागतो. नाटक किंवा कुठलीही कलाकृती सादर होत असताना, प्रेक्षक म्हणून आपण काही मूलभूत नियम पाळले पाहिजेत, याबाबत काही दुमत नसावं. आम्ही तिकीट काढून नाटक बघतो, त्यामुळे आम्ही वाट्टेल तसे वागू, या सबबीला तर अर्थच नाही. आपण अनेक सेवांसाठी पैसे मोजतो. ते पैसे त्या सेवांसाठी असतात; त्या बदल्यात आपण केवळ ती विशिष्ट सेवा विकत घेतलेली असते. सेवा देणारे लोक आपले नोकर होत नाहीत, ही गोष्ट अशा सबबी सांगणाऱ्यांनी ध्यानात ठेवायला हवी. ‘विमानाचं तिकीट काढलंय, पैसे मोजलेत म्हणून आता जरा पाच मिनिटं खिडकी उघडू द्या,’ असं म्हणून चालेल काय? किंवा हॉटेलमध्ये पैसे मोजले, म्हणून आपण तिथल्या प्लेट उचलून घरी आणत नाही. नाटकाचं तिकीट काढलंय, याचा अर्थ ती कलाकृती बघण्यासाठी मोजलेले ते दाम आहेत. त्या बदल्यात एक चोख कलाकृती सादर करण्याचं काम कलाकारांचं आहे. त्यामुळं कलाकारानं त्याच्या इतर वैयक्तिक अडचणी काहीही असल्या, तरी रंगमंचावर पाऊल ठेवल्यापासून ते पडदा पडेपर्यंत आपल्या भूमिकेत शिरून काम केलंच पाहिजे, ही अपेक्षा जेवढी रास्त, तेवढीच प्रेक्षकांनी त्या कलाकृतीचा सामुदायिक आस्वाद घेता येण्यासाठी केलेल्या नियमांचं पालन करण्याची अपेक्षाही योग्यच!
जेव्हा या अपेक्षांना काही कारणांनी तडे जायला सुरुवात होते, तेव्हा खरी अडचण येते. जेव्हा या अपेक्षा उभयपक्षी मान्य असतात आणि दोघांकडूनही त्या व्यवस्थित पाळल्या जातात, तोवर सगळं छानच चाललेलं असतं. मात्र, हल्ली मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळं या अपेक्षा पूर्ण होणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. मोबाइल वापरणाऱ्या अनेक लोकांना तो वापरण्याच्या सभ्य पद्धती अजिबात माहिती नसतात. मुळात एखादी व्यक्ती नियम पाळते म्हटलं, की सगळेच नियम पाळते आणि नियम तोडणारे सगळीकडेच नियम तोडतात. समोरच्या खुर्चीवर पाय टाकून बसणे किंवा मागून लाथा मारणे इथपासून ते मध्यंतरात चहा-वड्याच्या स्टॉलवर ढकलाढकली करणे, अगदी स्वच्छतागृहातही किळस येईल अशा पद्धतीने वागणे अशा गोष्टी करणारे लोकच मोबाइल वाजविणाऱ्यांमध्ये आघाडीवर दिसतात. याशिवाय पुण्यात तरी नाटकाला येणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असते. त्यांना मोबाइल नीट ‘सायलेंट मोड’वर टाकता येत नाही. फोन वाजला, की तो घेतलाच पाहिजे अशा मानसिकतेची ही पिढी आहे. नाटक सुरू असताना अचानक फोन वाजला, की त्यांची होणारी धांदल बघायची. वास्तविक, मोबाइल ‘स्विच ऑफ’ करणे किंवा ‘सायलेंट मोड’वर टाकणे हे फारच सोपं काम आहे. ही पिढी आपल्या नातवांकडूनही ते सहज शिकू शकते. या लोकांकडून मुद्दाम हे घडत नाही, हे जेवढं खरं, तेवढंच हे घडू नये यासाठी ते प्रयत्नही करत नाहीत, हेही तितकंच खरं!
फिल्म फेस्टिव्हलमध्ये जागतिक दर्जाचे चित्रपट बघणं हा एक आनंददायक अनुभव असतो. तिथं येणारा प्रेक्षक पुष्कळसा सुज्ञ असतो. मात्र, एरवी नेहमीच्या मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा बघायला गेलं, की आपल्यासमोर आज काय वाढून ठेवलंय, या भीतीनं पोटात गोळाच येतो. एखादा टाइमपास, करमणुकीचा सिनेमा असेल तर एक वेळ हा दंगा खपूनही जातो. मात्र, एखादा गंभीर, इन्टेन्स सिनेमा बघताना आजूबाजूला होणारे हे भयावह आवाज प्रचंड रसभंग करतात. तरुण पिढीच्या मुलांना काही बोलायची सोय नाही. ते फटकन उलट उत्तरं देतात. ‘थिएटर खरीद लिया क्या?’ असा केवळ अॅटिट्यूड नसतो, तर तसा प्रश्न ते थेट आपल्याला करतातही!
रसभंगाचे हे काहीसे फिजिकल प्रकार झाले. काही मानसिक त्रास देणारेही प्रकार आहेत. उदा. एखादा चर्चेतला सिनेमा आपण पाहत असतो. त्यात काही उत्कट दृश्यं असतात. रूढार्थानं ती सहजतेनं पाहायला मिळणारी दृश्यं नसतात. ती पाहत असताना अचानक कुठून तरी हशा ऐकू येतो... किंवा अगदीच अनाठायी अशी टिप्पणी ऐकू येते... आपण त्या दृश्यात गुंगून गेलो असताना या हशामुळं वा त्या बोलण्यामुळं आपला रसभंग होतो; मूडच जातो. कलाकाराला अपेक्षित असलेल्या ठिकाणी दाद न मिळणं किंवा नको त्या ठिकाणी चुकीची दाद वा प्रतिक्रिया येणं असं हल्ली वारंवार घडताना दिसतं. कशामुळं होतं हे? कुठलाही कलाकार त्याची कलाकृती तयार करतो ती लोकांनी पाहावी, समजून घ्यावी, त्याचा आनंद लुटावा यासाठी! त्याचं त्या कलाकृतीच्या माध्यमातून काही तरी एक सांगणं असतं. पण ते पुष्कळदा लोकांपर्यंत पोचतच नाही की काय, अशी शंका येते. हल्ली समाजमाध्यमांनी भावनांचं सपाटीकरण केलंय म्हणून असं होतंय, की एकूणच तरल भावनांच्या जोपासनेचा अभाव दिसतोय? काही तरी चुकतं आहे हे नक्की...
कला सादर करणारा कलाकार आणि तिचा आस्वाद घेणारा प्रेक्षक एकाच प्रतलात असायला हवेत. अर्थात ही आदर्श परिस्थिती झाली. दर वेळी असं होत नाही. त्यामुळं कलाकार एका विशिष्ट संवेदनशीलतेतून काही सांगू पाहत असेल आणि प्रेक्षक त्या विशिष्ट संवेदनशीलतेतून ती कलाकृती पाहत नसेल, तर गोंधळ होतो. प्रेक्षकाची अपेक्षा काही वेगळीच असते आणि त्याला कदाचित समोर काही वेगळंच दिसत असतं. त्यातून प्रतिक्रियेची प्रक्रिया विस्कटायला सुरुवात होते. विशेषतः सामूहिक आस्वादनाच्या जागांवर हे वारंवार घडताना दिसतं. चित्रपटगृहात सिनेमा पाहताना आपण एकटे पाहत नाही. आपल्यासोबत अनेक लोक तो पाहत असतात. त्यातल्या बहुतांश जणांच्या संवेदनेची तार सिनेमाशी जुळलेली दिसते आणि नेमक्या अशाच वेळी दोन-तीन बेसूर तारा छेडल्या जातात. तो कणसूर त्रासदायक असतो.
याचा जरा विचार केल्यावर असं लक्षात येतं, की प्रेक्षक किंवा आस्वादक म्हणून आपल्या भावभावना फारच ढोबळ, भडक व बटबटीत झाल्या आहेत. आनंद, दुःख, प्रेम, विरह, माया, द्वेष, संताप, सूड आदी ढोबळ आणि ठळक भावनाच तेवढ्या कलाकृतीतून ग्रहण केल्या जातात. त्यातही हिंसा, सूड, संताप आदी भावनांच्या प्रदर्शनाला मिळणारी दाद किंवा प्रतिसाद पाहण्याजोगा असतो. या ठळक भावनांच्या अधे-मधे काही तरल भावना लपलेल्या असतात. त्या शब्दांनी सांगता येत नाहीत; अनुभवाव्याच लागतात. या भावनांना साद देण्यासारखी परिस्थिती काही कलाकृती निश्चितच निर्माण करतात. आपल्यामध्ये मात्र त्या तरल भावनांचा कदाचित नीट परिपोष न झाल्याने आपण त्या कलाकृतीला जसा हवा तसा प्रतिसाद देऊ शकत नाही. करुणा किंवा सह-अनुभूती (सहानुभूती नव्हे!) या भावनांची त्रुटी विशेषत्वाने जाणवते. आपल्याकडच्या चित्रपटांत एकूणच थेट लैंगिक दृश्यं दाखवण्याचं प्रमाण कमी आहे. हल्ली मात्र ‘प्रौढांसाठी’ असे प्रमाणपत्र दिलेल्या बऱ्याच सिनेमांत अशी थेट लैंगिक दृश्यं दाखविली जातात. (या दृश्यांची कथानकातील गरज वा उपयुक्तता हा निराळ्या चर्चेचा विषय आहे.) अशा दृश्यांची आखणीदेखील त्या दृश्यात सहभागी असलेल्या स्त्री पात्रांच्या त्या वेळी असलेल्या भावना दर्शविण्यासाठी केल्याचं दिसून येतं. मात्र, हे समजून न घेणारा मोठा प्रेक्षकवर्ग अशा दृश्यांकडं निराळ्या नजरेनं पाहतो. त्या नजरेत दिग्दर्शकाला अपेक्षित असलेली पात्राविषयीची ‘सह-अनुभूती’ कुठे दिसत नाही.
आपल्याकडे एकूणच दृश्यसंस्कारांच्या बाबतीत आनंदीआनंद असल्यानं ही परिस्थिती निर्माण होते. एखादं चित्र कसं पाहावं, हे आम्हाला कुणी शिकवत नाही. आम्हाला वाचता येतं; पण लेखकाला त्या दोन वाक्यांच्या मध्ये काय म्हणायचंय हे समजत नाही. आम्हाला सिनेमा किंवा नाटकातील दृश्यांमागची प्रकाशयोजना, नेपथ्यरचना किंवा त्या दृश्याची भूमिती समजत नाही. एखाद्या कलाकृतीमधील अमूर्तता कळणं ही आपण रसिक म्हणून किंवा आस्वादक म्हणून जरा वरची इयत्ता गाठल्याचं लक्षण आहे. आपण त्या दृष्टीनं किती प्रयत्न करतो ही स्वतःला विचारून पाहण्याची गोष्ट आहे. कुठलीही सूक्ष्म, अमूर्त किंवा तरल भावना जाणण्याचा प्रयत्नच न करणं किंवा त्या गोष्टी हसून, चेष्टेवारी नेऊन सोडून देणं हे सध्या सर्रास होताना दिसतंय. अनेकांना तर लेखनातील उपहासही समजत नाही, असं आढळून येतं. त्यामुळं आस्वादकाकडून विशिष्ट गुणवत्तेची अपेक्षा करणाऱ्या कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी आपण समाज म्हणून कितपत सक्षम आहोत, असा प्रश्न अनेकदा पडतो.
आपल्या आजूबाजूचं जग फार वेगानं बदलतं आहे. नवी पिढी फार वेगानं सगळे बदल स्वीकारते आहे. अशा जगात वावरताना आणि त्या जगानुसार स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करताना आपण अनेकदा आपल्या हळुवार भावभावनांची नीट जोपासना करायला विसरतो. आयुष्यातले छोटे छोटे आनंददायक क्षण टिपायला, त्यातला आनंद लुटायला विसरून जातो. त्यातून भावनांचं प्रकटीकरण हळूहळू बंद होऊन जातं. टिपकागदासारखं मन गंजून जातं आणि जुन्या दरवाजाच्या बिजागरीसारखं सदैव कुरकुरू लागतं. अशी बधीर मनं घेऊन आपण समाज म्हणून वावरू पाहतो आहोत. त्यामुळं आपली सौंदर्यदृष्टी लोप पावली अन् जगण्यातली विसंगती खटकेनाशी झाली आहे. मग हा मुद्दा फक्त आस्वादनाच्या फरकापुरता मर्यादित राहत नाही, तर एकूणच आपल्या आयुष्याचा परीघ मर्यादित करण्याचा होऊन जातो.
दाद देऊन शुद्ध व्हावं, असं म्हटलं जातं. दाद देण्याचं महत्त्व असं मोठं आहे. कलेचा नीट आस्वाद घेता आला, की खुल्या मनानं आणि नेमक्या जागी दाद देता येते. ती त्या कलाकाराला आनंद देऊन जातेच; पण माणूस म्हणून आपल्यालाही समृद्ध करीत असते. असा आस्वाद सर्वांना घेता येवो आणि सगळे कणसूर लोप पावून जगण्याचा तंबोरा नीट सुरांत लागो, एवढीच साधी अपेक्षा!


(२२ मार्च २०२२)

---

रोहन मैफल - ‘पेन’गोष्टी - भाग ५ व ६

भाग ५
--------

वऱ्हाड निघालंय उदगीरला...
-----------------------------------


उदयगिरीचा कवतिकगंधित ‘धूप’ तुला दाविला...
स्वीकारावी माफी आता, न येता या संमेलनाला...

कुठूनसं हे गाणं ऐकू येऊ लागलं आणि अस्मादिकांची अगदी समाधी लागली. गार पाण्याचे हबकारे तोंडावर बसल्यावर लक्षात आलं, की हे स्वप्नातलं गाणं आहे. जाग आली तर कुमार गंधर्व आपलं ‘मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला...’ गात होते. तरीही त्यातल्या ‘धूप’मुळं हिंदीतल्या ‘धूप’ची आठवण आली आणि तेवढ्या सकाळीही घाम फुटला. मग लक्षात आलं, आपण स्वप्नात उदगीरला जाऊन आलो. कशासाठी हा प्रश्नच उद्भवत नाही - साहित्य संमेलनासाठीच!
बघा ना! वैशाखासम भासणाऱ्या आणि भाजणाऱ्या, चैत्रातल्या रणरणत्या उन्हात मराठवाड्याच्या दक्षिणेस, तेलंगण व कर्नाटकाच्या हद्दीत उदयगिरी, अर्थात उदगीर नगरीत मराठी सारस्वतांचा मेळा भरतो आहे. येत्या वीकान्तास तीन दिवस मराठी साहित्य संमेलनाचा नुसता गल्बला माजणार आहे. आमचे ‘साहित्यसुलतान’ कवतिकराव ठाले पाटलांच्या मराठवाडी आग्रहामुळं अखेर हे संमेलन मराठवाड्याच्या, म्हणजेच संतांच्या पवित्र भूमीत घेण्याचं ठरलं. मार्च किंवा एप्रिलमध्ये हे संमेलन होणार म्हणजे होणारच, असं ठाले पाटलांनी एवढ्या निक्षून सांगितलं, की शेजारच्या तेलंगण व कर्नाटक या राज्यांनीही घाबरून तिकडंही मराठी साहित्य संमेलनांचा फड लावलाय, म्हणे! आमच्या कवतिकरावांचं थोडंसं ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’मधल्या बबन्यासारखं आहे. तो कसं, ‘विंग्रजीत पत्र लिहायचं म्हणजे जे मनामंदी येईल ते ठोकून द्यायचं दनादना... हाय काय...’ या तत्त्वाला जागून सगळ्या गोष्टी फाडफाड करत असतो, तसं आमचे कवतिकरावही कुणाचीही अजिबात भीडभाड न बाळगता, ‘जे मनामंदी येईल ते’ फाडफाड बोलून टाकत असतात.
ते काहीही असलं, तरी साहित्य संमेलन हा प्रकार आपल्याला आवडतो. आता उदगीरला जायला जमेल की नाही, हे काही माहिती नाही. मात्र, ग्रामीण महाराष्ट्रात होणारी सगळीच्या सगळी संमेलनं तुडुंब गर्दीची आणि यशस्वी झाली आहेत, यात शंका नाही. अर्थात नगर, परभणी, सातारा, परळी इथल्या संमेलनांच्या वेळी बडे बडे साहित्यिकही हजेरी लावायला होते. आता तेवढं मोठं नाव असलेले साहित्यिकच उरलेले नाहीत, असं वाटू लागलंय. म्हणजे बघा, नगरच्या संमेलनात साक्षात विंदा करंदीकर साध्या झब्बा-पायजम्यात आणि खांद्याला शबनम लावून ग्रंथदिंडीत चाललेले बघितले आहेत. त्यामानानं गेल्या २५ वर्षांत साहित्य संमेलनांचे अध्यक्ष आणि तेथे येणारे लोकप्रिय साहित्यिक यांचं प्रमाण घटतच गेलेलं दिसतंय. ते डोंबिवलीतलं ‘अक्षय’ संमेलन तर अगदीच पडलं होतं. त्याआधी पिंपरीत झालेलं ‘पीडीपी’ संमेलन मात्र जोरदार झालं होतं. करोनाकाळानंतर अगदी आत्ता, डिसेंबरात नाशिकमध्ये झालेल्या संमेलनातही  साहित्यप्रेमींचा उत्साह परतून आल्याचं दिसलं होतं. त्याच उत्साहाच्या जोरावर कवतिकरावांनी उदगीरच्या या ‘हॉट’ संमेलनाचा घाट घातलेला दिसतो.
हे संमेलन आमच्या ना. य. डोळे सरांच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात रंगणार आहे, हे ऐकून आनंद जाहला. बाकी एवढ्या उन्हात तिथं जायचं कसं, या विचारानं महाराष्ट्रदेशीच्या अनेक बिऱ्हाडांतल्या ‘व्यंकटभाऊजी’ आणि ‘वहिनीं’मध्ये ‘काय हुईल, कस्सं हुईल...’ असे विचार डोक्यात ‘बुंगा’यला सुरुवात झालीय, अशी वार्ता कानी आहे. उदगीरमध्ये राहायची व्यवस्था काय, पाण्याचं काय, काही लोक लातूर किंवा नांदेडमध्ये राहणार अशी चर्चा आहे त्यात आपलं तर नाव नसेल ना, अशा एक ना दोन अनेक शंकांचा भुंगा बहुतेकांच्या डोक्यात पिंगा घालू लागला आहे. संमेलनाध्यक्ष मा. भारतराव सासणे सरांची अवस्था ‘काशिनाथ’सारखी झाली असणार, याविषयी आपल्या मनात मुळीच शंका नाही. एवढं सगळं संमेलनाचं वऱ्हाड त्यांनाच घेऊन जायचंय. त्यात संमेलनाचे ‘जानराव’ हे थेट राष्ट्रपतीच असल्यानं या संमेलनात खऱ्या अर्थानं ‘जान’ आली आहे, हे नाकारून चालणार नाही. कवतिकरावांचा उत्साह काही सांगता येत नाही. उदगीरच्या रस्त्यांवर ग्रंथदिंडीत त्यांनी कोत्तापल्ले-सासणे यांना फुगडी घालायला लावतीलच ते! गेली काही वर्षं उद्घाटनाला मा. शरदचंद्रजी पवारसाहेब नसतील, तर तो ‘फाउल’ धरला जातो. त्यामुळं साहेब आहेतच. गोव्याचे ज्ञानपीठ विजेते साहित्यिक दामोदर मावजो हेदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीवरून गोमंतकात वादाच्या गजाली झडायला सुरुवात झालीच आहे. मात्र, काही झालं तरी कवतिकरावांनी मावजोंना ‘आवजो’ म्हणत हिरवा कंदील दिल्यानं ते येणारच आहेत.
संमेलनाची कार्यक्रमपत्रिका आणि त्यातल्या परिसंवादाचे विषय बघितले, तर गेल्या काही वर्षांत बहुतेक वेळा यातले परिसंवाद किंवा त्यातले विषय ऐकून झाले आहेत, हे लक्षात येईलच. दुसऱ्या दिवशी राजन गवस यांची मुलाखत होणार आहे. विनोद शिरसाठ यांच्या ‘साधने’मुळं ती ‘दणकट’ होईल, यात शंका नसावी. तरुण कादंबरीकारांशी संवादाचा एक कार्यक्रम आहे, तो ऐकण्याजोगा वाटतो आहे. त्यात प्रवीण बांदेकर, रमेश इंगळे उत्रादकर, मोनिका गजेंद्रगडकर, आसाराम लोमटे, प्रसाद कुमठेकर आणि युवा साहित्य अकादमी विजेते प्रणव सखदेव यांच्यासोबत गप्पा रंगणार आहेत.
रविवारचा तिसरा दिवस राष्ट्रपतींच्या उपस्थितीमुळे विशेष ठरेल. यापूर्वी सांगलीच्या संमेलनात तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आल्या होत्या. (त्यामुळे मावळते संमेलनाध्यक्ष अरुण साधू यांना भाषणास वेळ न दिल्याने ते सूत्रे प्रदान करण्यासाठी तिथे गेलेच नव्हते. यंदा नारळीकर सरांना न येण्यासाठी हे एक चांगलं कारण आहे खरं!) असोच.
बाकी संमेलन सुरू व्हायच्या आधी दोन दिवस उदगीरमध्ये खरा दणका होईल तो अजय-अतुल यांच्या संगीत रजनीचा. संमेलनाची सुरुवात खऱ्या अर्थानं ‘झिंगाट’ होणार आहे. दुसऱ्या दिवशी एका वाहिनीवरील लोकप्रिय हास्य कार्यक्रमातली ‘नेहमीची यशस्वी’ मंडळी येणार असल्यानं उदगीरमधली त्यांची चाहते मंडळी खूश होतील. बाकी काही नसलं, तरी संमेलन ‘वाजलं’ पाहिजे, यात कुणाच्या मनात शंका नसावी.
हे संमेलन पार पडलं, की मे महिन्यात साहित्य महामंडळाचं कार्यालय मुंबईकडं जाईल. मराठवाड्याचं ‘कवतिक’ संपेल आणि पश्चिम दिशेवर ‘उषा’काल सुरू होईल. तोवर आपण ‘बुंग ऽऽऽ’ म्हणत संमेलनाच्या उत्तरपूजेची वाट बघायची...

(१४ एप्रिल २०२२)

---

भाग ६
--------

उत्सव बहु थोर होत...
--------------------------

उदगीरचे ‘हॉट हॉट’ संमेलन संपले तरी साहित्यजगतातील उत्साह आणि उत्सवाचे वातावरण अजूनही वाफाळते, गरमागरम आहे. शिवाय सध्या पुण्यापासून ते ठाण्यापर्यंत आणि चांद्यापासून ते बांद्यापर्यंत सगळा महाराष्ट्रच वेगवेगळ्या कारणांनी तप्त झाला असल्याने, साहित्य क्षेत्र तरी त्याला कसे अपवाद ठरणार! त्यामुळेच सध्या सगळीकडे पुस्तक प्रकाशनांचे पेंडिंग सोहळे पार पाडताना दिसत आहेत. पुस्तकांची नवनवी दालने सुरू होत आहेत, (काही महत्त्वाची नियतकालिके बंद पडली तरी) नवी मासिके सुरू होत आहेत, पुस्तकांची प्रदर्शने भरत आहेत... असे एकूण ‘उत्सव बहु थोर होत’ पद्धतीचे वातावरण सगळीकडे दिसते आहे.
वास्तविक मे महिना म्हणजे सुट्टीचा महिना. या काळात शाळांना सुट्टी पडली रे पडली, की प्रवासाला निघायचे असा पूर्वीचा खाक्या असायचा. गेली दोन वर्षे कोव्हिडकाळामुळे हे सगळे वेळापत्रक बिनसले. यंदा मात्र सगळी परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसते आहे. त्यामुळेच दोन वर्षांपासून थांबून राहिलेल्या अनेक पुस्तकांचे प्रकाशन दणक्यात होताना दिसत आहे. विशेष म्हणजे पूर्वी पुण्यात पुस्तक प्रकाशनांसाठी काही ठरावीक ठिकाणे असायची. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा माधवराव पटवर्धन हॉल, पत्रकार भवनाचे सभागृह, एस. एम. जोशी सभागृह ही ती ठरलेली ठिकाणे. ही ठिकाणे आजही लोकप्रिय आहेत, यात वाद नाही. शहराच्या मध्यवर्ती भागात आणि सर्वांना यायला-जायला सोयीची अशी ही ठिकाणे आहेत, हे त्या लोकप्रियतेमागचे कारण आहे. अर्थात आता अनेक जण वेगवेगळी, नवी, चांगली ठिकाणे शोधत आहेत. चित्रपटविषयक कार्यक्रमांना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (एनएफएआय) ऑडिटोरियम कायमच लाभत असते. या जोडीला आता गोखले इन्स्टिट्यूटचा ज्ञानवृक्ष आणि परिसर, भांडारकर इन्स्टिट्यूटचे नवे झालेले अँफी थिएटर, कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेत झालेले रमा-पुरुषोत्तम सभागृह व तिथले सुंदर अँफी थिएटर, पी. एन. गाडगीळ समूहातर्फे खडकवासल्याच्या पुढे कुडजे गावात लवकरच सुरू होत असलेले ‘झपूर्झा’ हे कला संकुल, मयूर कॉलनीतील शाकुंतल सभागृह अशा किती तरी नव्या जागांनी पुण्यातील सांस्कृतिक विश्वाला हाकारे घालायला सुरुवात केली आहे. यापैकी काही ठिकाणी तर नियमित सांस्कृतिक कार्यक्रम होतही आहेत. शहरात अशी नवनवी सांस्कृतिक घडामोडींची केंद्रे होत राहणे फार महत्त्वाचे आहे. शहरात असलेली गर्द झाडी, वनराई यांना ‘शहराची फुप्फुसे’ असे म्हटले जाते. या नव्या सांस्कृतिक केंद्रांना ‘शहराच्या मानसिक पोषणाची केंद्रे’ असे म्हटले पाहिजे.
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद यासारख्या मोठ्या शहरांत अशी सांस्कृतिक केंद्रे असतात व तिथे कायम काही ना काही कार्यक्रम होत असतात. त्यामुळे त्या शहरांतील सांस्कृतिक जीवन बहरलेले दिसते. याउलट अवस्था ग्रामीण महाराष्ट्राची आहे. बऱ्याच तालुक्यांच्या ठिकाणी चांगली ग्रंथालये आहेत. मात्र, नवी पुस्तके घ्यायची म्हटले, तर त्यांना शहराचीच वाट धरावी लागते. ऑनलाइन पुस्तकविक्रीच्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्यांच्याकडे आपल्याला हवी ती पुस्तके उपलब्ध असतातच, असे नाही. आता मुंबई व पुण्यातल्या मोठ्या प्रकाशकांनी (त्यात ‘रोहन प्रकाशन’ही अर्थातच आले!) आता स्वत:च्या वेबसाइटवरून थेट पुस्तके ऑलाइन उपलब्ध करून, ग्रामीण वाचकांची मोठीच सोय केली आहे, यात शंका नाही.
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुस्तकांच्या जगात जी हालचाल होते, ती यासाठी महत्त्वाची आहे. किती कोटींची उलाढाल झाली किंवा मागील संमेलनापेक्षा कमी झाली की जास्त, हे मुद्दे महत्त्वाचे असले तरी केवळ तेवढेच मुद्दे महत्त्वाचे नाहीत. ग्रामीण भागात संमेलन झाले, की त्या परिसरातल्या अनेक वाचकांची पुढील वर्ष-दोन वर्षांसाठीची तरी पुस्तकांची भूक मिटते. संमेलनात पुस्तकांच्या दालनांसमोर आजही गर्दी नक्कीच होते. पुढच्या पिढीतील अनेक संभाव्य वाचक तिथे येत असतात. साहित्यिकांना बघत असतात. पुस्तक दालनांमधून हिंडत असतात. त्यांच्यासाठी ही संमेलने म्हणजे एक पेरणी असते. या मुलांनी तिथे यावे, पुस्तके बघावीत, हाताळावीत यासाठी प्रकाशकांपासून ते आयोजकांपर्यंत सारेच उत्सुक असतात. पुढच्या पिढीचा हा प्रतिसाद फार महत्त्वाचा असतो. अनेकदा तर असे वाटते, की अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने यापुढची सर्व संमेलने तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्हा केंद्र असलेल्या, पण तुलनेने लहान शहर असलेल्या ठिकाणीच भरवावीत. मोठ्या शहरांमध्ये साहित्य संमेलनांना मिळणारा प्रतिसाद व या निमशहरी भागांत मिळणारा प्रतिसाद यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. तेव्हा या गोष्टीचा खरोखर विचार व्हायला हवा.
आत्ताच्या काळात पुस्तकांचे महत्त्व खरे तर नव्याने सांगायला नको. सध्या समाजमाध्यमांचा वाढता प्रभाव आपण बघतो आहोत. या माध्यमांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे आपल्या मनावर कब्जा करायला सुरुवात केलीच आहे. आपण नकळत दुसऱ्याच्या इशाऱ्यावर नाचणारे रोबो तर होत नाही ना, अशी भीती अनेकदा मनात येते. अशा वेळी पुस्तकांचा फार आधार वाटतो. पुस्तके न बोलता, आपल्याला बरेच काही शिकवत असतात. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे, आपली विवेकबुद्धी शाबूत ठेवायला मदत करतात. आपली जी काही बरी-वाईट मते असतील, ती तर्काच्या कसोटीवर घासून-पुसून, तावून-सुलाखून घेण्याची संधी देतात. यासाठी पुस्तके हवीत, पुस्तक प्रकाशनेही हवीत आणि त्यासाठीचे उत्सवही हवेत... आपल्याला माणूस म्हणून जरा अधिक उन्नत व्हायचे असेल, तर या उत्सवाला पर्याय नाही!

(१५ मे २०२२)

---



31 Oct 2022

दृष्टी-श्रुती डिजिटल दिवाळी अंक २२ - लेख

कुछ खोया, कुछ पाया...
-----------------------------

आपल्या आयुष्यात हव्याशा वाटणाऱ्या गोष्टींची कायमच चुकामूक होत असते. जे हवं ते मिळालंय अशा गोष्टींची संख्या कायमच कमी भरते. एवढंसं आयुष्य आणि काय काय करायचंय रे देवा, असं सतत वाटत राहतं. वय लहान असतं, तेव्हा स्वप्नाळूपणा अर्थात अधिक असतो. आपल्याला जे जे वाटतं ते ते सगळं आपण करू शकू, असा एक विलक्षण आत्मविश्वास तेव्हा वाटत असतो. प्रत्यक्षात आयुष्य बरंच क्रूर असतं, हे हळूहळू कळत जातं. काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात, हे कळायलाही वयाची एक मॅच्युरिटी यावी लागते.
आयुष्यात आत्तापर्यंत आलेली वळणं आणि झालेल्या चुकामुकी बघितल्या, तर गंमत वाटते. काही गोष्टी निसटून गेल्या, याची खंतही वाटते. मात्र, सतत त्याचं दु:ख उगाळत बसावं, एवढंही नंतरच जगणं वाईट झालं नाही. उलट अनपेक्षितपणे काही अशा गोष्टी मिळाल्या की जगणं समृद्ध झाल्याचं समाधान वाटत राहिलं. 

दहावीपर्यंतचं जन्मगावातलं जगणं अगदीच निरागस म्हणावं असं होतं. सातवीनंतर गाव सोडून शहरात आलो, हे आयुष्यातलं पहिलं मोठं स्थलांतर. दहावीला बरे मार्क पडले. अशा मुलांनी (तेव्हा) एक तर मेडिकलला जायचं असतं किंवा इंजिनीअरिंगला. डिप्लोमा इंजिनीअरिंग हा आणखी एक तुलनेनं सुलभ पर्याय होता. मीही तोच निवडला. खरं तर मी निवडला, असं म्हणवत नाही. सगळे डिप्लोमाला जा म्हणाले, म्हणून मीही ‘बरं’ म्हटलं. करिअर कौन्सेलिंग, कल चाचणी वगैरे प्रकार तेव्हा नव्हतेच. आपल्याला काय आवडतंय, आपला ओढा कुठं आहे हे काहीही कळत नव्हतं. तसं तपासायची कुठलीही औपचारिक-अनौपचारिक यंत्रणा आजूबाजूला नव्हती. मग ठरल्याप्रमाणे पुण्याला गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकला आलो. तोवर लहान शहरात राहिलेला मी, पुण्यासारख्या मोठ्या शहरात येऊन पूर्ण बावरून गेलो. वयही लहानच होतं. जेमतेम सोळावं वर्षही पूर्ण व्हायचं होतं. अशा वेळी एकदम घर तुटणं हा अनुभव वेगळा, नवा होता. त्याची सवय नव्हती. शिवाय तोवरचं सगळं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं होतं. इथं इंग्लिश मीडियममधून थेट इंजिनीअरिंगचे विषय शिकायचे हे काही झेपेना. बाकीची बरीच मुलं माझ्यासारखीच होती. पण ती घासून अभ्यास करायची. माझा तो पिंड नव्हता. (हे आता लक्षात येतंय.) एकदा पुस्तक वाचलं, की थेट परीक्षेत जाऊन उत्तरं द्यायची आणि चांगले गुण मिळायचे, अशी तोवर सवय होती. इथं ती जाड जाड पुस्तकं उघडली की झोप यायला लागली. अखेर जे व्हायचं तेच झालं. सपशेल अपयश! एकदा नाही, दोनदा नापास झालो. पहिली दोन वर्षं पूर्ण करायला चार वर्षं लागली. तुटलेल्या पतंगासारखं आयुष्य भिरभिरत होतं. पुढं अशा काही गोष्टी घडल्या, की मी ‘थर्ड इयर’ला धाडकन इंजिनीअरिंग सोडून घरी परत आलो. पुन्हा परत कधीही तिथं न जाण्यासाठी! घरच्यांना हा धक्काच होता. मात्र, त्यांनी मला समजून घेतलं. कसंबसं रेटून तिसरं वर्षही पूर्ण केलं असतं, तर मी इंजिनीअर झालोही असतो. मात्र, माझ्या निर्णयामुळं इंजिनीअरिंगशी चुकामूक झाली ती झालीच.
आज विचार करतो, की मी इंजिनीअर झालो असतो आणि ‘लोकसत्ता’तली ती नोकरी अपघाताने मला मिळाली नसती तर मी कोण झालो असतो? मला आयुष्यभर कदाचित हे कळलं नसतंं, की माझ्यात पत्रकार-लेखक होण्यासारखे गुण आहेत. मी नगरच्या एमआयडीसीत कुठल्याशा कारखान्यात शिफ्टमध्ये नोकरी करत राहिलो असतो. कधी कधी माझी लेखनाची उबळ वर आली असती. मग मी स्थानिक वृत्तपत्रांना पत्रं पाठवत राहिलो असतो किंवा लेख पाठवत राहिलो असतो. त्यातलं एखादं प्रसिद्ध झालं असतं, तरी मिरवत राहिलो असतो. (या विचारानंही आज काटा येतो.) पत्रकारितेच्या जगानं मला जगाची जी विशाल खिडकी उघडून दिली आणि माझं आयुष्य खऱ्या अर्थानं समृद्ध केलं त्यातलं काहीच कदाचित झालं नसतं. या पेशामुळं मला अनेक मान्यवर, मोठ्या लोकांशी सहज संपर्क साधता आला; त्यातल्या काहींशी मैत्री करता आली, त्यांच्या सहवासातून अनेक गोष्टी शिकता आल्या यातलं काही म्हणता काहीही झालं नसतं. सोशल मीडिया आल्यावर मी कदाचित त्यावरही माझं लिखाण शेअर केलंच असतं. मात्र, माझी आतापर्यंत जी सहा-सात पुस्तकं प्रकाशित झाली, ती कदाचित कधीच झाली नसती. पत्रकारितेमुळं वेगवेगळ्या राज्यांत, वेगवेगळ्या घटनांचं वार्तांकन करण्यासाठी जायला मिळालं, ते कधीच मिळालं नसतं. त्या जगण्याची कल्पना करूनही धसकायला होतं. थोडक्यात, इंजिनीअरिंगची वाट चुकली तरी फारसा खेद कधी वाटला नाही. उलट आपण चुकीच्याच मार्गाला गेलो होतो, असंच वाटत राहिलं.
खरं तर माझं गणित चांगलं होतं. तशी चित्रकलाही चांगली होती. आयुष्यात पहिलं बक्षीस दुसरी असताना मिळालं ते चित्राबद्दलच. मला नववीत असताना एलिमेंटरी परीक्षेत ए ग्रेड मिळाली होती. मात्र, दहावीचं वर्ष म्हणून मी इंटरमीजिएट परीक्षा दिली नाही. ती परीक्षा दिली असती, तर? लहानपणी मला हत्ती चांगला काढता यायचा. घरी भोंडल्याच्या वेळी पाटावर रांगोळीनं हत्ती काढायचं काम माझ्याकडं असे. जीवशास्त्राच्या अनेक आकृत्या मी वहीत चांगल्या काढत असे. त्याचा उपयोग इंजिनीअरिंगला झाला. मिनी ड्राफ्टरनं मशिन डिझाइन काढायचं असे, ते मला चांगलं जमत असे. बाकी पोरं ट्रेसिंग वगैरे मारत बसायची. मी मात्र तल्लीनतेनं ते डिझाइन काढत बसायचो. मात्र, पुढं चित्रकलेचा हात सोडला तो सोडलाच. मात्र, चित्रं बघायला आजही आवडतात. अगदी मुलाला मुंबईला नेऊन तिथली मोठी चित्रकला प्रदर्शनं दाखविली आहेत. कुठल्याही म्युझियममध्ये चित्रांच्या दालनात मी अधिक रमतो. अमूर्त शैलीतली चित्रं बघताना कधी कधी वाटतं, चित्रकलेचा हात सोडला नसता, तर समोरचं हे चित्र जरा अधिक लवकर आणि नीट कळलं असतं. पण चित्रकलेची चुकामूक झाली ती झालीच!
सॉम (स्ट्रक्चर ऑफ मशिन), टॉम (थिअरी ऑफ मशिन), मशिन डिझाइन आदी विषय इंजिनीअरिंगमुळंच समजले. (किंवा खरं तर नाही समजले!) पुन्हा आयुष्यात हे विषय आणि त्याचा अभ्यास यांचा काहीही संबंध आला नाही. मात्र, त्या दिवसांनी काहीच दिलं नाही असं कसं म्हणू? इंजिनीअर लोकांचं डोकं एका विशिष्ट पद्धतीनं विचार करतं. गणिती पद्धतीनं मेंदूत काही गोष्टींचं विश्लेषण केलं जातं. सहसा भावनिक प्रतिसाद कमी आणि व्यावहारिक प्रतिसाद जास्त असतो. त्याचा त्या लोकांना अतिशय अभिमान वाटतो. मला मी कधी कधी तसा विचार करतो असं वाटतं आणि ते इंजिनीअरिंगच्या चार-पाच वर्षांचं देणं असावं. चुकामूक झाली असली, तरी त्या रस्त्यावरून थोडा प्रवास केला असल्यानं पुढील प्रवासाचा अंदाज नक्कीच करू शकतो.
इंजिनीअरिंगला येण्याचा सर्वांत मोठा फायदा असा झाला, की मी फार लहान वयात पुण्यात आलो आणि एकटा राहायला शिकलो. आयुष्यात हे स्वावलंबी होणं माझ्यासाठी पुढं फार महत्त्वाचं ठरलं. स्वत:चे कपडे धुण्यापासून ते सगळी कामं स्वत: करणं, सिनेमापासून ते बस प्रवासापर्यंत कुठलीही गोष्ट एकट्यानं एंजॉय करणं, जगात शेवटी आपले आपणच असतो याचा साक्षात्कार होणं हे सगळं माझ्याबाबत फार लहान वयात झालं आणि त्याचा पुढच्या जगण्यात निश्चितच उपयोग झाला. 

लहानपणी चुकामूक झालेली आणखी एक गोष्ट म्हणजे वाद्यवादन. माझ्या आईला फार वाटे, की मला एखादं तरी वाद्य वाजवता यावं. त्यातही शक्यतो तबला! मात्र, आमच्या लहान गावात असे कुठलेही वाद्यवादनाचे क्लास वगैरे नव्हते. नंतर शहरात आलो, तरी मी स्वत:हून काही त्या गोष्टीचा पाठपुरावा केला नाही. माझ्या धाकट्या आत्याचे यजमान पेटी वाजवत. सुट्टीत त्यांच्याकडं गेलो, की मी त्या पेटीवर सुरांशी झटापट करू पाही. अगदी बेसिक ‘सा रे ग म’ मला वाजवता यायचं. उलट आणि सुलट तेही शिकलो. मात्र, त्यापुढं माझी मजल जाईना. नंतर इंजिनीअरिंगच्या गर्तेत अडकल्यानंतर तर या गोष्टींच्या मागे लागणं राहूनच गेलं. गॅदरिंगला अनेक मुलं वेगवेगळी वाद्यं वाजवत. आम्ही पहिल्या वर्षाला असताना (आताचा प्रसिद्ध कवी) संदीप खरे तिसऱ्या वर्षाला होता. त्या गॅदरिंगला त्यानं स्वत: पेटी वाजवून स्वरचित कविता (मन तळ्यात मळ्यात) म्हणून दाखवली होती, तेव्हा फारच भारी वाटलं होतं. कुणी बँजो वाजवी, तर कुणी गिटार! त्या पोरांना शिट्ट्या वाजवून दाद देणाऱ्या पोरी बघून मनस्वी हेवा वाटायचा. मला तर शिट्टीही वाजवता यायची नाही. वाद्यवादन ही आपल्या कुवतीबाहेरची गोष्ट आहे, हे शेवटी मी मनोमन मान्य केलं. नंतर ‘सकाळ’मध्ये काम करायला लागल्यावर अप्पा बळवंत चौकात मेहेंदळेंचं वाद्यांचं दुकान दिसायचं. तिथली पेटी, तबला-डग्गा वगैरे वाद्यं बघितली की मला आईच्या इच्छेची आठवण यायची. अजूनही येते. कदाचित यापुढं फारच नेटानं प्रयत्न केला तर एखादं वाद्य वाजवायला जमेलही. पण तोवर तरी चुकामूक झाली आहे, असंच म्हणावं लागेल. आता मला गाणं आवडतं, लय समजते, ताल कळतो; मात्र त्यातल्या शास्त्रीय संगीताचं व्याकरण समजत नाही. एखादा राग ओळखता येत नाही. मात्र, तरीही गेली कित्येक वर्षं ‘सवाई’ला वारकऱ्यांसारखा जातो आहे. का कोण जाणे, पण ते सूर सतत खेचून घेतात. वाद्यं वाजवता आली नाहीत, तरी मला गाणं चालीत व्यवस्थित म्हणता यायचं आणि आवाजही (फुटेपर्यंत) बरा असावा. पण मी गाणंही शिकलो नाही किंवा शिकू शकलो नाही. त्याही गोष्टीची चुकामूक झालीच. मला चांगल्या नकला करता येतात. वेगवेगळे आवाज काढता येतात. तेव्हा अनेक मित्र किंवा नातेवाइक म्हणायचे, की तू नाटकात जा, मुंबईला जा... या क्षेत्रात तुला नक्की नाव मिळेल. पण तो माझा इंजिनीअरिंगचा संघर्षाचा काळ होता. कुठलंही गोष्ट आपल्याला जमेल याचा आत्मविश्वासच नाहीसा झाला होता. त्यामुळं मुंबईला जायचं धाडस अंगात अजिबात नव्हतं. मी त्या महानगरात सर्वप्रथम गेलो ते माझ्या वयाच्या २१ व्या वर्षी! पहिल्याच भेटीत मी मुंबईच्या प्रेमात पडलो. (ते अजूनही कायम आहे.) या महानगरात आपण राहायला हवं, इथंच काम-धंदा शोधायला हवा, असं वाटायचं. मात्र, मनाच्या तळात, अगदी खोलवर मी ही इच्छा दाबून टाकली. असं का, याचं उत्तर आता सांगता येत नाही. कदाचित आत्मविश्वासाचा अभाव हेच कारण असावं. खरं तर संधी मिळाली तर मी केव्हाही या शहरात जाऊ शकतो. मात्र, तिथंच स्थायिक होणं, मुंबईकर होणं या गोष्टीची चुकामूकच झाली असं वाटतं. 

तीच गोष्ट एम. ए.च्या पदवीची. जर्नालिझमची पदवी मिळाल्यानंतर मी फर्ग्युसन महाविद्यालयात एम. ए. मराठीला प्रवेश घेतला होता. मात्र, घरात अचानक उद्भवलेल्या एका मोठ्या अडचणीमुळं मी तो कोर्स अर्धवटच सोडला. परीक्षाच दिली नाही. तेव्हा ते जे राहिलं ते राहिलंच. नंतर जर्नालिझममध्येही एम. ए. करण्याची संधी आली होती. मात्र, तेव्हाही काही तरी थातुरमातुर कारणांमुळं मी ते केलं नाहीच.
मला फिरायचीही अतोनात आवड. एखादी फिरतीची नोकरी मिळावी आणि त्यानिमित्ताने सगळा देश पालथा घालता यावा, असंही वाटायचं. पण ‘सकाळ’मध्ये नोकरी मिळाली आणि आयुष्यातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यासारख्या वाटल्या. त्यामुळं पुन्हा वेगळी नोकरी शोधायच्या फंदात (पुढची १३ वर्षं) पडलोच नाही. नोकरीतही डेस्कची जबाबदारी मिळाली. रिपोर्टिंगची मिळती, तर जरा तरी फिरता आलं असतं. अर्थात असा फिरण्याचा जॉब स्वत: न शोधणं हा माझा आळस आहेच. (आयुष्यात नक्की कोणत्या गोष्टी खरंच मिस झाल्या आणि कोणत्या आपल्या आळसापायी चुकल्या, याचा प्रामाणिक आढावा घेणं कठीण आहे.)
स्वयंपाक करायला शिकणं, एम. ए. पूर्ण करणं किंवा वाद्य वाजवता येणं या गोष्टी खरं तर वयाच्या कुठल्याही टप्प्यावर पूर्ण करता येऊ शकतील. मात्र, जेव्हा त्या कराव्याशा वाटत होत्या किंवा करायला हव्या होत्या त्या वयात आणि त्या काळात त्यांची चुकामूक झाली हे नक्की! मला वाटतं, आयुष्य यालाच म्हणत असावेत. आपण कुठल्या गाडीचं तिकीट काढलं आहे, यापेक्षा आपल्याला कुठल्या गाडीत बसायची संधी मिळते, हेच शेवटी वास्तव उरतं. ती गाडी आपली म्हणायची आणि प्रवासाचा आनंद लुटायचा, एवढी शिकवण आजवरच्या आयुष्यानं नक्कीच दिली आहे. त्यासाठी मी माझ्या आयुष्याशी कृतज्ञ आहे.

---

(पूर्वप्रसिद्धी : दृष्टी-श्रुती डिजिटल दिवाळी अंक २०२२)

---


2 Oct 2022

‘सहेला रे’विषयी...

घट्ट विणीची ‘गोधडी’
-------------------------

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘सहेला रे’ हा नवा मराठी चित्रपट म्हणजे, सह्याद्रीच्या कड्यावर उभे राहिल्यानंतर येणाऱ्या थंडगार झुळकीसारखा एक प्रसन्न अनुभव आहे. ‘मानवी नातेसंबंधांविषयी भाष्य करणारा आणखी एक मराठी चित्रपट’ किंवा ‘एका महिलेचं दिग्दर्शन असलेला आणखी एक स्त्री-प्रधान चित्रपट’ एवढ्यावरच किंवा या धर्तीवर या चित्रपटाचं वर्णन करणं योग्य ठरणार नाही. कलावंत म्हणून असलेल्या प्रगल्भ विचारांतून आलेल्या कल्पनेचा हा एक सहज-स्वाभाविक आविष्कार आहेच; शिवाय ‘टिपिकल’ वाटू शकणाऱ्या गोष्टीतून ही कलाकृती शेवटी एक वेगळा विचार मांडते आणि तो सौम्य, पण ठामपणे सांगते हेही महत्त्वाचं!
एकविसाव्या शतकातल्या आधुनिकोत्तर जगण्याच्या वेगानं भोवंडलेल्या मनांना आपल्या प्रत्येक कृतीचं या ना त्या प्रकारे समर्थन करावं लागतं. हे समर्थन कधी आत्मक्लेशातून येतं, तर कधी न्यूनगंडातून! आपल्या चुकलेल्या गोष्टींना नैतिकतेचा मुलामा देणं आपल्याला फार आवश्यक वाटत असतं. समाजानं घालून दिलेल्या, आखून दिलेल्या चौकटींपलीकडचा कोणताही विचार सहजी पटत नाही, समजावून घेता नाही. असा विचार मनात येणं हे जवळपास प्रत्यक्ष व्यभिचाराइतकंच भयंकर मानलं जातं. स्त्री आणि पुरुष या दोघांनाही या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. मात्र, त्यातही स्त्रीला अधिक. याची कारणं आपल्या सध्याच्या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत आहेत, हे निराळं सांगायला नको. अशा परिस्थितीत स्त्री-पुरुष नात्याकडं बघण्याचा एका वेगळा दृष्टिकोन हा चित्रपट आपल्याला देतो.
लग्न झाल्यानंतर २० वर्षांनी आपल्या नात्यात पूर्वीचा ‘तो’ किंवा ‘ती’ परत आली तर... या थीमवर कदाचित अनेक कादंबऱ्या, नाटकं, चित्रपट आले असतील. अशा वेळी ‘सहेला रे...’ सुरुवातीला त्याच वळणावर जाताना बघून, ‘अरे, हाही त्यातलाच दिसतोय की... पुढं काय होणार हे सांगू शकतो आपण’ असं आपल्याला वाटायला लागतं. मात्र, मृणालमधल्या दिग्दर्शिकेनं या कथानकाचा लगाम अगदी पक्का धरून ठेवला आहे. या गोष्टीतून आपल्याला नक्की काय सांगायचं आहे, याचं पक्कं भान तिला आहे. त्यामुळं ही गोष्ट जिथं पोचायची तिथवर व्यवस्थित पोचते. एकही धागा उसवत नाही, की एकही टाका चुकीचा बसत नाही. जे सांगायचं आहे, त्याची वीण घट्ट असल्यानं ते तर व्यवस्थित आपल्यापर्यंत पोचतंच; शिवाय जे थेट संवादांतून बोललं जात नाही तेही आपल्यापर्यंत पोचतं. याचं श्रेय दिग्दर्शिकेसोबतच अभिनेत्यांनाही! 
लग्न असो वा अन्य कुठल्याही कारणांनी, स्त्रीचं जगणं अपेक्षांच्या ओझ्यानं कायमच दबलेलं असतं. सगळ्यांचं सगळं करता करता तिला स्वत:साठी कधी वेळ काढायला मिळेलच आणि तिच्या मनात कधी काळी वसत असलेल्या स्वप्नांची पूर्ती करायला मिळेलच याची कुठलीही खातरी नाही. इथली नायिकाही अशाच पेचात पडलेली आहे. वरवर पाहता सगळं चांगलं आहे, सुखाचं आहे, क्वचित हेवा वाटावं असंही आहे. मात्र, हे सगळं जगणं एका बाजूला आणि लग्नापूर्वीची स्वप्नाळू ती एका बाजूला... एवढा काळाचा लंबक दोन टोकांना गेला आहे. अशा वेळी स्वत:चं अस्तित्व सिद्ध करण्याची धडपड आणि दुसरीकडं या सगळ्या धडपडीची कुठे दखलही नसणं या द्विधेत सापडलेली नायिका अखेर त्यातून कशी बाहेर पडते आणि आपल्या स्वकर्तृत्वाची ‘गोधडी’ कशी विणते, हे पडद्यावरच पाहणं इष्ट! 
यात शमाच्या मुख्य भूमिकेत स्वत: दिग्दर्शक - म्हणजे मृणाल - असल्यानं गोष्टी सोप्या झाल्या आहेत. दिग्दर्शक म्हणून आपल्याला शमाच्या व्यक्तिरेखेकडून नक्की काय हवंय, हे मृणालला नीट माहिती आहे. गोष्टीचं वर सांगितलेलं स्वरूप बघता, त्यात निसरड्या वाटांची सर्वार्थाने शक्यता बरीच होती. पण दोन्ही अर्थांनी ही तारेवरची कसरत दिग्दर्शिका व अभिनेत्री मृणालने व्यवस्थित केली आहे. 
यात नायिकेच्या आयुष्यात पुन्हा आलेल्या ‘त्या’ची - अर्थात निरंजन काणेची - भूमिका सुमीत राघवनने केली आहे. या भूमिकेसाठी त्याचं कास्टिंग अतिशय परफेक्ट आहे. सुमीतमधली सहजता, त्याच्यात असलेलं एक मिश्कील मूल आणि त्याच वेळी प्रगल्भही वाटणारं व्यक्तिमत्त्व यामुळं तो या भूमिकेत अगदी फिट आहे. त्यानं अगदी नैसर्गिक सहजतेनं नायिकेच्या ‘सहेला’ची ही भूमिका साकारली आहे. सुबोधनं शमाच्या पतीची - विक्रमची - भूमिकाही उत्तम केली आहे. विक्रमचं कामात सतत व्यग्र असणं, शमाला सतत गृहीत धरणं, त्याच वेळी मनातून तिच्यावर प्रेम असणं या सगळ्या भावना सुबोध पुरेशा प्रगल्भतेनं आपल्यापर्यंत पोचवतो. तुलनेनं या भूमिकेची लांबी कमी असली तरी तो लक्षात राहतो.
चित्रपटाचं छायांकन आणि संगीत उच्च दर्जाचं आहे. सोपान पुरंदरे यांनी गरुडमाचीचा सगळा देखणा, हिरवागार परिसर सुंदर टिपला आहे. चित्रपटातला शमा आणि निरंजन यांच्यातला सर्वांत महत्त्वाचा भाग इथंच चित्रित झाला आहे. सह्याद्रीच्या कुशीत ट्रेक करताना, निसरड्या पायवाटांवरून जाताना, एकमेकांना नव्यानं ओळखताना, हात धरताना-सोडताना, जवळ येताना-दूर जाताना, पडक्या वास्तूच्या साक्षीनं जुन्या आठवणींना जागवताना... निसर्ग सतत या दोघांच्या सोबत असतो. हे किती सूचक आहे! निसर्गातल्या पावसाच्या थेंबाइतक्या किंवा त्या हिरव्या तृणपात्याइतक्या त्या भावना सच्च्या असतात, निखळ असतात! ट्रेक संपताना नायिकेचं भानावर असणं आणि विचारांवर ठाम असणं हेही सहज-स्वाभाविकपणे पटून जातं. यात उत्कृष्ट छायांकनाचा नक्कीच वाटा आहे. तीच गोष्ट संगीताची. ‘सई बाई गं...’ ही अरुणा ढेरे यांची कविता सिनेमाभर ‘थीम साँग’सारखी येते. सलीलनं अतिशय सुरेल असं हे गाणं केलं आहे. मधुरा दातार आणि आर्या आंबेकरनं ते उत्तम गायलं आहे. दुसरं गाणं आहे ते ‘रे मनाला घे विचारून एकदा...’! वैभव जोशीचे अप्रतिम शब्द आणि आदर्श शिंदेचा आवाज यामुळं हे गाणंही श्रवणीय झालं आहे.
सुबोध, सुमीत आणि मृणाल यांच्याव्यतिरिक्त चित्रपटात अन्य पात्रांच्या फार मोठ्या भूमिका नाहीत. तरी शमाच्या सासूच्या भूमिकेत सुहिता थत्तेंचा ठसका मजा आणतो. गजानन परांजपेही छोट्या भूमिकेत दिसतात. याशिवाय सुरुवातीच्या पार्टीच्या दृश्यात मृणालचे पती ॲड. रुचिर कुलकर्णीही दिसतात. सिनेमात काही त्रुटी नक्कीच आहेत. मात्र, सिनेमाच्या मूळ गाभ्याशी आपण एकरूप झालो, तर त्या सहज लक्षात येणार नाहीत, एवढ्याच आहेत.
थोडक्यात, प्रगल्भ विचारांच्या कलावंतांनी आपल्या पिढीची म्हणून सांगितलेली ही गोष्ट पुढच्या पिढ्यांनाही आवडेल, अशीच आहे. आपल्या जगण्यात आपल्याला असा ‘सहेला’ गवसणं आणि त्यातून आपल्या जगण्यात आशयपूर्ण अर्थ भरणं हाच या निर्मळ सिनेमाचा साधा-सोपा संदेश आहे.


---

प्लॅटफॉर्म : प्लॅनेट मराठी

---



9 Sept 2022

राणी एलिझाबेथ लेख

एक होती राणी...
---------------------

राजघराणे आणि राजसत्ता ही संकल्पना आता आधुनिक काळात फार महत्त्वाची राहिली नसली, तरी राजघराण्याला देव्हाऱ्यात बसवून पारंपरिक भक्तिभावाने त्याचे गुणगान करणारे काही देश जगाच्या पाठीवर अजून शिल्लक आहेत. युनायटेड किंगडम अर्थात ब्रिटन हा त्यातलाच एक. या देशाची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवार, ८ सप्टेंबर रोजी निधन झाले. राणीपदावर तब्बल ६९ वर्षे राहण्याचा विक्रम एलिझाबेथ यांच्या नावावर नोंदला गेलाय. या राणीविषयी...


ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय (वय ९६) यांचे गुरुवारी निधन झाल्याने ब्रिटिश साम्राज्याचे राजपद सर्वाधिक काळ भोगलेली व्यक्ती आता काळाच्या पडद्याआड गेली आहे. एलिझाबेथ यांनी २०१५ मध्येच वयाच्या ८९ व्या वर्षी ब्रिटनची सर्वांत प्रदीर्घ काळ राणी म्हणून हयात असलेली व्यक्ती हा विक्रम नोंदविली होता. त्यानंतर सात वर्षे त्या हयात होत्या. राणी म्हणून पदावर असण्याचा त्यांचा काळ सुमारे ६९ वर्षांहून अधिक होता. यापूर्वी हा विक्रम एलिझाबेथ यांच्या खापरपणजी राणी व्हिक्टोरिया यांच्या नावावर होता. त्या १८३७ ते १९०१ या काळात ब्रिटनच्या राणी होत्या. हा विक्रम राणी एलिझाबेथ यांनी मोडला. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी बालमोराल येथील पॅलेसमध्ये अखेरचा श्वास घेतला, तेव्हा काळाचा एक विस्तृत पट पाहणारी एक जिवंत दंतकथा आता इतिहासात जमा झाली आहे.
ब्रिटन ही वास्तविक जगातील सर्वांत जुनी लोकशाही. या देशाने जगाला आधुनिक लोकशाही विचार दिला, शास्त्रशुद्ध आचार-विचारांची बैठक दिली, विज्ञाननिष्ठा, नवे प्रदेश शोधण्याचे साहस, कमालीचे स्वदेशप्रेम, शिस्त आदी गुण दिले याविषयी सर्वसाधारण जगात एकमत असावे. याच वेळी कमालीचे परंपरावादी आणि जुन्या गोष्टी निष्ठेने जतन करणारेही हेच लोक आहेत. त्यामुळे या देशात राजसत्तेचे महत्त्व अजूनही अबाधित आहे. राजा किंवा राणी रूढ अर्थाने राज्य करीत नसले, तरी शिक्क्याचे धनी तेच आहेत. ब्रिटनचे लष्कर अजूनही रॉयल आर्मी आहे आणि त्यांचे नौदलही रॉयल नेव्ही. ब्रिटिशांना आपल्या राजघराण्याविषयी कमालीचे प्रेम आहे. शिवाय ही राणी तशी केवळ फक्त ब्रिटनची नाही, तर कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आदी राष्ट्रकुलातील अनेक देश या राणीला आपलीच राणी मानतात. (भारत राष्ट्रकुलात असला, तरी आपण त्या राणीला आपली राणी मानत नाही.) यातले राजकारण बाजूला ठेवून राणी आणि राजघराणे यांच्याविषयी ब्रिटनमध्ये एवढी आत्मीयता का, याचा शोध घेणे औत्सुक्याचे ठरेल.
ब्रिटन काय, किंवा जगभरातील अनेक देश काय, राजा हाच एके काळी सार्वभौम सत्ताधीश असे. राजा गेला, की वंशपरंपरेने त्याचा मुलगा राजा होणार हे ठरलेले असे. रयतेला त्यात वेगळे काही वाटत नसे. भारतातही अगदी अलीकडच्या काळापर्यंत संस्थाने अस्तित्वात होती. या संस्थानांतील लोकांना त्यांच्या तत्कालीन राजांविषयी भरभरून बोलताना आपण आजही ऐकतो. (याला अपवाद आहेतच.) राजघराण्यांविषयी लोकांना असलेल्या या आपुलकीत कुठे तरी त्या संस्थानाकडून मिळणारी सुरक्षितता आणि एका मोठ्या कुटुंबासारखी मिळणारी वागणूक हे प्रमुख घटक असावेत. अगदी ब्रिटनमधील लोकांमध्येही हीच मानसिकता दिसते. राणी एलिझाबेथ यांचे सर्वसामान्य नागरिकांसोबत अनेक फोटो आहेत. बदलत्या काळानुसार बदलणारी ही राणी होती, असे एकूण तिच्या स्वभावावरून वाटते. इतर सर्वसामान्य माणसांप्रमाणेच तिनेही आयुष्यात चढ-उतार सोसले, भोगले. त्या त्या वेळी दुःखाला वाट करून दिली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तिने राजघराण्याच्या अनेक खटकणाऱ्या परंपरा बदलून काही चांगल्या गोष्टी रूढ केल्या. त्यात १९९२ मध्ये तिने प्राप्तिकर आणि भांडवली नफा कर भरायला सुरुवात केली. याशिवाय तिचे अधिकृत निवासस्थान असलेल्या बकिंगहॅम पॅलेस आणि विंडसर पॅलेस या वास्तू जनतेला पाहण्यासाठी खुल्या केल्या. त्यातून मिळणाऱ्या पैशांतूनच या वास्तूंची देखभाल करण्यात येऊ लागली. आणखी महत्त्वाचे म्हणजे राजघराण्यातल्या वारसाक्रमातील पुरुषप्रधानता तिने संपुष्टात आणली. यामुळे आता जो कोणी थोरला असेल, मुलगा वा मुलगी, तो राजा किंवा राणी होऊ शकणार आहे. या राणीने लोकांमधले आणि राजघराण्यातले अंतर बऱ्यापैकी कमी केले. तिने वॉकअबाउट नावाचा (आपल्याकडच्या जनता दरबारासारखा) सर्वसामान्य नागरिकांना भेटण्याचा कार्यक्रम सुरू केला. शिवाय ही राणी बऱ्यापैकी शांत स्वभावाची आणि सहृदय असल्याचे दिसते. ती फारशा कुठल्या वादात अडकली नाही. शांतपणे आपले जीवन जगत राहिली. मुलगा युवराज चार्ल्स व युवराज्ञी डायना यांचे वादळी वैवाहिक जीवन, घटस्फोट व नंतर डायनाचा मृत्यू या सर्व घटना तिने पाहिल्या, पचवल्या. राजघराण्याला आपले दुःख जाहीरपणे व्यक्त करता येत नाही किंवा आनंदाचेही प्रदर्शन करता येत नाही. त्यांच्या प्रतिष्ठेच्या अवाढव्य कल्पनांसमोर त्यांचे व्यक्तिगत आयुष्य संपूर्णपणे दबून जाते, यात शंका नाही.
एलिझाबेथ राणीचे आयुष्य हा कदाचित एका कादंबरीचा किंवा भव्य चित्रपटाचा सहज विषय होऊ शकतो. अलीकडे ‘नेटफ्लिक्स’वर आलेल्या ‘द क्राउन’ या महामालिकेमुळे राणी आणि एकूणच राजघराण्याविषयी पुन्हा जगभर चर्चा सुरू झाली. यातल्या नायिकेने आता खऱ्या आयुष्यातून एक्झिट घेतली आहे. तिच्या आयुष्यात अनेक भावभावनांचे हिंदोळे आहेत. मुळात ही एलिझाबेथ नावाची तरुणी ब्रिटनची राणी होण्याची शक्यताच नव्हती. कारण ती तिच्या आई-वडिलांचे तिसऱ्या क्रमांकाचे अपत्य होती. राजपुत्र अल्बर्ट, ड्यूक ऑफ यॉर्क आणि त्यांची पत्नी लेडी एलिझाबेथ बॉवेस-लिऑन यांची ही कन्या. मात्र, राजा पाचव्या जॉर्जच्या निधनानंतर एलिझाबेथचे काका एडिवर्ड सातवा राजा झाला. पण अमेरिकी घटस्फोटिता असलेल्या वॅलिस सिम्प्सन हिच्याबरोबर लग्न करायचे म्हणून तो राजगादी सोडून चक्क पळून गेला. (शेवटी प्रेम श्रेष्ठ!) त्यामुळे एलिझाबेथचे वडील राजा झाले (सहावे जॉर्ज) आणि एलिझाबेथ राजगादीची वारस. युवराज्ञीने १९४७ मध्ये फिलीप माउंटबॅटन यांच्याशी विवाह केला. दुसऱ्या महायुद्धानंतरचा तो कठीण काळ होता. युवराज्ञीने स्वतःचा ड्रेस विकत घेण्यासाठी रेशन कुपन वापरल्याची नोंद आहे. (राणीच्या पुढील काळातील साधेपणाचे रहस्य त्या युद्धजन्य परिस्थितीत काढलेल्या दिवसांत असावे.) एलिझाबेथच्या पतीने, फिलीपने, नवे ड्यूक ऑफ एडिंबरा हे पद स्थापन केले व स्वतःला तसे नामाभिधान घेतले. या दाम्पत्याला चार मुले झाली. प्रिन्स चार्ल्स, प्रिन्सेस ॲन, प्रिन्स अँड्र्यू व प्रिन्स एडवर्ड अशी ही चार मुले. एलिझाबेथचे वडील सहावे जॉर्ज यांचे सहा फेब्रुवारी १९५२ रोजी निधन झाले, तेव्हा ती पतीसह केनियाच्या सहलीवर होती. वडील गेले, त्याच क्षणी ती राणी झाली. मात्र, विधिवत राज्यरोहणाचा सोहळा वेस्टमिन्स्टर ॲबेमध्ये दोन जून १९५३ रोजी झाला. तेव्हा हा समारंभ प्रथमच टीव्हीवरून प्रसारित करण्यात आला होता.
तेव्हापासून आत्तापर्यंत एलिझाबेथ यांनी राजपदावर सुखेनैव राज्य केले. तिचा मुलगा प्रिन्स चार्ल्स आता ७३ वर्षांचा आहे. तो आता ब्रिटनचे राजा होईल. ब्रिटनमध्ये या राजघराण्यात त्यानंतर कित्येक चढ-उतार झाले. एका व्यक्तीच्या आयुष्यात ६९ वर्षांचा काळ हा तसा मोठा काळ आहे. जगातही केवढे बदल झाले या काळात! राणी मात्र आहे तिथेच होती. तिच्या चेहऱ्यावर एक मिश्कील भाव दिसे. एखाद्या प्रेमळ, अनुभवी आजीबाईसारखी ही राणी दिसायची. अगदी परवा ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी त्यांची भेट घेतली, तेव्हा प्रसिद्ध झालेला फोटो हा या राणीचा शेवटचा सार्वजनिक फोटो ठरला. आपल्या शांत स्वभावाप्रमाणेच या राणीने अगदी शांतपणे या जगाचा निरोप घेतला. ब्रिटिश नागरिकांसह जगभरातील तिच्या चाहत्यांच्या मनात दु:खाचे मळभ दाटले असणार, यात शंका नाही.


---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे; ९ सप्टेंबर २०२२)

---

1 Sept 2022

पत्रकारितेतील २५ वर्षे - लेख

पत्रकारितेची पंचविशी...
---------------------


आज १ सप्टेंबर २०२२. बरोबर २५ वर्षांपूर्वी, म्हणजे १ सप्टेंबर १९९७ रोजी मी पुण्यात ‘सकाळ’मध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून रुजू झालो. आज पत्रकारितेतील कारकिर्दीला २५ वर्षं पूर्ण होत आहेत. खरं तर त्याही आधी म्हणजे नोव्हेंबर १९९४ मध्ये मी पहिल्यांदा ‘लोकसत्ता’त मुद्रितशोधक म्हणून रुजू झालो होतो. त्या अर्थाने या व्यवसायात येऊन आता जवळपास २८ वर्षं होतील. मात्र, उपसंपादक म्हणून आणि कायम कर्मचारी म्हणून रुजू झालो ते ‘सकाळ’मध्येच. त्यानंतर जवळपास १३ वर्षं २ महिने मी सलग तिथंच काम केलं. नंतर ऑक्टोबर २०१० मध्ये मी ‘सकाळ’चा राजीनामा दिला आणि १५ नोव्हेंबर २०१० रोजी पुण्यात नव्याने आवृत्ती सुरू करणाऱ्या ‘मटा’त रुजू झालो. ३१ ऑक्टोबर २०१० ते १४ नोव्हेंबर २०१० हे पंधरा दिवस मी कुठेच काम करत नव्हतो. हा छोटासा काळ सोडला तर गेली २५ वर्षं मी सतत वृत्तपत्रांच्या कचेरीत संपादकीय विभागात काम करतो आहे. प्रशिक्षणार्थी पत्रकार, मग उपसंपादक, मग कायम उपसंपादक, मग वरिष्ठ उपसंपादक, मग मुख्य उपसंपादक अशा पायऱ्या मी ‘सकाळ’मध्ये चढत गेलो. नंतर ‘मटा’त याच पदावर रुजू झालो. इथं मुख्य उपसंपादक, सहायक वृत्तसंपादक, उपवृत्तसंपादक आणि आता वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहे. (वृत्तपत्रांच्या कार्यालयांत पदांची संख्या फार नसते. त्यामुळे इथली सीनिऑरिटी ‘किती वर्षं काम करत आहात?’ यावरच जास्त मोजली जाते.)
गेली २५ वर्षं या पेशात असल्यानं या काळात पुण्यात, महाराष्ट्रात, देशात आणि जगभरात घडलेल्या बहुतांश घटनांचा साक्षीदार मला होता आलं. या घटनांची बातमी कशी होते आणि आपण ती वाचकांपर्यंत कशी बिनचूक आणि नेमकी पोचवायची असते, हे मला या काळात शिकायला मिळालं. ‘सकाळ’मध्ये माझ्यासोबत संजय आवटे, मंदार कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी, सूरश्री चांडक आणि संजीव ओहोळ हे सहकारी रुजू झाले होते. आदल्याच दिवशी लेडी डायनाचं अपघाती निधन झालं होतं आणि त्या दिवशी याच बातमीची सगळीकडं चर्चा होती.
तेव्हा इंद्रकुमार गुजराल आपले पंतप्रधान होते. राज्यात मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. पुढील सगळा काळ वेगवान राजकीय घडामोडींचा होता. नंतर केंद्रात वाजपेयी पर्व सुरू झालं. सोनिया गांधींनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारलं. भारतानं पोखरणमध्ये अणुचाचण्या केल्या, नंतर कारगिल युद्ध झालं. शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. राज्यात युतीची सत्ता जाऊन काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आलं. एकविसाव्या शतकाचं सगळीकडं जल्लोषात स्वागत झालं. ‘वायटूके’ हा शब्द तेव्हाचा परवलीचा शब्द झाला होता. जागतिकीकरणाच्या पहिल्या दशकाच्या शेवटी देशात बरंच काही बदलत होतं. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेतील ट्विन टॉवर्स पडले. भुजमध्ये जोरदार भूकंप झाला, त्यात हजारो माणसं मृत्युमुखी पडली. कोठेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणानं महाराष्ट्र हादरून गेला. मांढरदेवी दुर्घटना घडली. मोठी त्सुनामी आली. ‘शायनिंग इंडिया’चा प्रचार उलटला आणि देशातून भाजपची सत्ता गेली. काँग्रेस आणि सहकारी पक्षांची सत्ता आली. अमेरिकबरोबर अणुकरार झाला. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. अमेरिकेनं लादेनचा खात्मा केला. भारतानं क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. दिल्लीत अण्णांचं आंदोलन झालं. दिल्लीतच ‘निर्भया’ प्रकरण घडलं. देशात २०१४ मध्ये पुन्हा सत्तापरिवर्तन घडलं आणि मोदींचं सरकार आलं. राज्यातही भाजप-सेना युतीची सत्ता आली आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. सर्वत्र स्मार्टफोनचा बोलबाला सुरू झाला. व्हॉट्सअपसारखी संदेश यंत्रणा अधिक लोकप्रिय ठरू लागली. आर्कुटपाठोपाठ फेसबुकवर असणं ही ‘इन थिंग’ मानली जाऊ लागली. एक ते दीड जीबी क्षमता असलेल्या मोबाइल फोनपासून एक टीबी क्षमतेच्या फोनपर्यंत आणि पाच मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्यापासून १०८ मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्यापर्यंत तंत्रज्ञानाची अफाट प्रगती झाली. २०१६ मध्ये नोटाबंदी झाली. पुढच्याच वर्षी जीएसटी लागू झाला. २०१९ मध्ये माध्यमांचे सर्व अंदाज धुळीला मिळवीत मोदींनी अधिक ताकदीने पुन्हा सत्ता मिळविली. राम मंदिराचा विषय मार्गी लागला. काश्मीरबाबतचं कलम ३७० रद्द झालं. डिसेंबर २०१९ पासून जगाला करोना नामक महाभयानक विषाणूनं ग्रासलं. पुढची दोन वर्षं जगासोबत भारतानंही या महासाथीला हिमतीनं तोंड दिलं.

मंदार व मी जर्नालिझमच्या दिल्ली दौऱ्यात...
हा सर्व प्रवास वृत्तपत्रांच्या कार्यालयांतून पाहणं हा अतिशय समृद्ध करणारा अनुभव होता. विजय कुवळेकर, अनंत दीक्षित, यमाजी मालकर, सुरेशचंद्र पाध्ये, नवनीत देशपांडे या संपादकांच्या हाताखाली ‘सकाळ’मध्ये; तर अशोक पानवलकर, पराग करंदीकर आणि श्रीधर लोणी या संपादकांच्या हाताखाली ‘मटा’मध्ये काम करायला मिळालं. या सर्वच संपादकांनी मला खूप काही शिकवलं. वैयक्तिक उत्कर्षाच्या अनेक संधी दिल्या. ‘सकाळ’मध्ये राजीव साबडे सरांनी आम्हाला सुरुवातीला प्रशिक्षित केलं. वरुणराज भिडे, मल्हार अरणकल्ले, विजय साळुंके, अशोक रानडे, लक्ष्मण रत्नपारखे, रमेश डोईफोडे, अनिल पवार, प्रल्हाद सावंत, शशिकांत भागवत, मुकुंद मोघे, चंद्रशेखर पटवर्धन, मुकुंद लेले, उदय हर्डीकर, वर्षा कुलकर्णी, स्वाती महाळंक, स्वाती राजे, नयना निर्गुण, मीना शेटे-संभू, गोपाळ जोशी, सुहास यादव, दत्ता जोशी, संजय डोंगरे, अरविंद तेलकर हे सर्व ज्येष्ठ सहकारी होते. बातमीदारांत डॉ. सुधीर भोंगळे, संतोष शेणई, निसार शेख, आबिद शेख, सुरेश ठाकोर, उद्धव भडसाळकर आदी दिग्गज मंडळी होती. सुरेशचंद्र पाध्ये सरांनी अनेक अर्थांनी अडचणीच्या काळात खूप मदत केली. अभिजित पेंढारकर, सिद्धार्थ खांडेकर, दीनदयाळ वैद्य, योगेश कुटे, मंगेश कुलकर्णी, मंगेश कोळपकर, सुभाष खुटवड, प्रसाद इनामदार हे सर्व मित्र माझ्यानंतर ‘सकाळ’मध्ये रुजू झाले. अभिजित व मंदारशी विशेष मैत्र जमलं. अभिजितनं आणि मी ‘मुक्तपीठ’, ‘कलारंजन’ या पुरवण्या एकत्र पाहिल्या. अतिशय धमाल असा काळ होता तो! कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाही, असे संस्कार आमच्यावर झाले होते. त्यामुळंच ‘आता माझी ड्युटी संपली’ किंवा ‘आज माझी सुट्टी आहे,’ ही कारणं सांगणं तिथं अजिबात संभवत नसे. आपण २४ तास इथं सेवेला बांधलो गेलो आहोत, अशी वृत्ती अंगी बाणली होती. आम्ही १९९९ मध्ये मराठवाडा आवृत्ती सुरू केली, तेव्हा त्या टीममध्ये मी होतो. अंगी वेगळंच स्फुरण चढलं होतं तेव्हा! मालकर सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो. मोठ्या जिद्दीनं आम्ही तेव्हा मराठवाड्यात ‘सकाळ’ रुजवला. तेव्हा तिथल्या अनेक बातमीदारांशी ओळखी झाल्या, त्या आजही कायम आहेत. ‘सकाळ’मध्ये ‘झलक’ हे सांस्कृतिक कार्यक्रमांची दैनंदिनी सांगणारं सदर माझ्याकडं अगदी सुरुवातीला आलं. त्यानिमित्तानं पुण्यातल्या सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक जणांशी मैत्री झाली, ती आजतागायत कायम आहे. तेरा वर्षांनंतर ‘सकाळ’ सोडून ‘मटा’त रुजू होण्याचा निर्णय तसा अवघड होता. मात्र, ‘मटा’चं आणि टाइम्स ग्रुपचं आकर्षण होतं. शिवाय ‘सकाळ’मधले बरेच सहकारी ‘मटा’त येतच होते. त्यामुळं अखेर ‘मटा’त येण्याचा निर्णय घेतला आणि गेली १२ वर्षं इथं कार्यरत आहे. इथंही सुरुवातीला पराग करंदीकर आणि नंतर श्रीधर लोणी (आणि मुंबईवरून अशोक पानवलकर सर) यांचं कायम मार्गदर्शन आणि सहकार्य मिळालं, मिळतं आहे. मी ‘सकाळ’मध्ये साडेतीन वर्षं सलग दर रविवारी ‘कॉफीशॉप’ हे सदर लिहिलं. नंतर ‘मटा’त रुजू झाल्यानंतर इथं ‘टी-टाइम’ हे सदर सलग चार वर्षं रविवारी लिहिलं. या दोन्ही सदरांतील निवडक लेखांची नंतर पुस्तकं झाली. याशिवाय दोन्ही वृत्तपत्रांत हिंदी-मराठी (व एक इंग्रजी) चित्रपटांची एकूण ३०७ परीक्षणं लिहिली. अखेर २०१४ च्या अखेरीस या कामातून (स्वेच्छेनं) अंग काढून घेतलं.
‘पुणे मटा’चा पहिला अंक प्रेसला जातानाचा क्षण...

‘मटा’त अगदी सुरुवातीला प्रिंटिंग मुंबईतच व्हायचं. तेव्हा ९.४५ ची डेडलाइन असायची. त्यामुळं रोज फार धावपळ व्हायची. कुठलीही बातमी चुकू नये किंवा आपला अंक प्रिंटिंगला गेल्यावर जगात फार काही महत्त्वाचं घडू नये, असं वाटायचं. सुदैवानं एखादा अपवाद वगळल्यास तसे प्रसंग फार घडले नाहीत. भीमसेन जोशी यांच्या निधनानंतर आणि अगदी अलीकडे लता मंगेशकर यांच्या निधनानंतर ‘टीम मटा’नं मोठ्या मेहनतीनं खास अंक काढले होते. याशिवाय ‘मटामैफल’सारखा साहित्यविषयक उपक्रम ‘मटा’नं पुण्यात सुरू केला आणि त्याला पुणेकरांनी फारच जोरदार प्रतिसाद दिला. याशिवाय ‘मटा हेल्पलाइन’पासून ते ‘श्रावणक्वीन’पर्यंत आणि अगदी अलीकडे शनिवारवाड्यावर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मध्यरात्री ध्वजारोहण करण्यापर्यंतच्या सर्व उपक्रमांना पुणेकरांनी कायमच पाठिंबा दिला आहे. वाचकांच्या पत्रव्यवहाराचं ‘बहुतांची अंतरे’ हे सदर मी ‘मटा’त अगदी गेल्या वर्षापर्यंत, म्हणजे सलग दहा वर्षं सांभाळलं. यानिमित्त अनेक वाचकांशी जोडला गेलो, हा आनंद काही वेगळाच!
या काळात ‘सकाळ’तर्फे २००१ मध्ये तमिळनाडू विधानसभेची, तर २००४ लोकसभा निवडणुकीच्या वेळी ओडिशामधील निवडणूक कव्हर करण्याची संधी मला मिळाली. पुढं २००७ मध्ये थायलंडचा एक छोटा दौराही करायला मिळाला. ‘मटा’तर्फे बंगळूर, उदयपूर येथील काही कार्यक्रम कव्हर करण्याची संधी मिळाली. मात्र, २००२ मध्ये मला संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या पोलिसांच्या आप्तांशी भेटून एक मोठी स्टोरी करण्याची जी संधी मिळाली, ती आत्तापर्यंतची माझी सर्वाधिक अविस्मरणीय असाइनमेंट आहे.
मी या क्षेत्रात अपघाताने आलो. खरं तर ठरवून यायला हवं होतं. असं असलं तरी आतापर्यंतची ही अडीच दशकांची वाटचाल मला बरंच समाधान आणि खूप काही शिकवून जाणारी ठरली आहे. शिकण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. माझ्या काही मर्यादा आहेत आणि त्याचीही मला नीट कल्पना आहे. हल्ली आठ-दहा वर्षं पत्रकारितेत काढली, की अनेक जण ‘ज्येष्ठ पत्रकार’ होतात. मला पंचवीस वर्षांनंतरही केवळ अनुभवाच्या आधारावर ज्येष्ठ म्हणवून घ्यायचा आपला अधिकार नाही, असं मनापासून वाटतं.
हा टप्पा सिंहावलोकन करण्यासाठी नक्कीच योग्य आहे. त्यामुळं जे काही मनात आलं ते (नेहमीप्रमाणे एकटाकी) लिहून काढलं आहे. असो. तटस्थपणे कुणी या वाटचालीचं मूल्यमापन केल्यास त्याला ही काही फार ग्रेट कामगिरी वाटणार नाहीही कदाचित; मात्र जे काही काम केलं, ते प्रामाणिकपणाने आणि या व्यवसायाची नीतिमूल्यं कायम जपून, एवढं नक्कीच म्हणू शकतो. ही कमाईदेखील मला महत्त्वाची वाटते.

----

(नोंद : सर्वांत वरील छायाचित्र ‘सकाळ’मधील माझा सहकारी गजेंद्र कळसकर यानं बालेवाडी स्टेडियमच्या समोर १९९८ मध्ये काढलेलं आहे.)

---

जडणघडणीचे दिवस - हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

अविस्मरणीय असाइनमेंट - लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

दीक्षितसाहेब - हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----

7 Aug 2022

‘एकदा काय झालं!!’बद्दल...

स्वीकाराची समंजस गोष्ट
-----------------------------

आपण वेगवेगळ्या भावनांवर आरूढ होऊन जगणारी माणसं आहोत. जग दिवसेंदिवस अधिकाधिक क्रूर, रुक्ष आणि संवेदनाहीन होत चाललं आहे, असं म्हणताना अगदी भाबडी, देवभोळी, साधी आणि संवेदनशील माणसंही आपल्याला भरपूर दिसतात. अशा माणसांमुळंच जग चाललं आहे, असंही वाटून जातं. दुसऱ्याच्या दु:खामुळं आपल्या डोळ्यांत पाणी येणं, खरोखर दु:ख होणं ही एक विशेष प्रकारची संवेदनशीलता आहे. अशा या संवेदनशीलतेची परीक्षा हल्ली हरघडी होत असते. आपल्या सभोवती एवढं काय काय आव्हानात्मक सगळं सुरू असताना, वेदना-दु:ख-त्रास यांनी मन घायाळ होत असताना तर या संवेदनशीलतेची कसोटीच असते. अशा वेळी आपण जे काही जगलोय, अनुभवलंय, सोसलंय, जाणलंय आणि या मिश्रणातून आपलं जे काही व्यक्तिमत्त्व तयार झालंय, त्यातून आपला प्रतिसाद ठरत असतो. आपल्या जडणघडणीचा, संस्कारांचा एक अंदाजही त्यातून येत असतो. 
डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं!!’ हा नवा सिनेमा आपली अशी सगळ्या पातळ्यांवर परीक्षा घेतो. आपल्यात माणूसपण कितपत शिल्लक आहे, संवेदनांची मुळं जिवंत आहेत की थिजून गेलीयत, संस्कारांची बाळगुटी पेशींत रुजली आहे की नाही या सगळ्यांची कसून परीक्षा होते आणि शेवटी डोळ्यांतून वाहणारे अश्रू व नि:शब्द झालेलं मन आपण या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची ग्वाही देतात. आपला आपल्यावरच पुन्हा विश्वास बसतो. आपल्या आयुष्यात, आपल्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या माणसांचं मोल आपल्याला कळतं. बहिणाबाईंच्या ‘...एका श्वासाचं अंतर’ या ओळींचा अर्थ आतून उलगडतो आणि पोटात खड्डाही पडतो. त्याच वेळी आपल्या प्रियजनांना त्या एका समंजस स्वीकारासाठी तयार करण्यासाठी आपल्या जगण्याची गोष्ट पुन:पुन्हा सांगत राहिली पाहिजे, ही असोशीही वाटू लागते.
‘एकदा काय झालं!!’ ही सलीलच्या आतापर्यंतच्या जगण्यातील सर्व अनुभवांतून तयार झालेली कलाकृती आहे. आपण जे काही जगतो, ज्या धारणांसह जगतो, ज्या संवेदनांसह जगतो, ते सगळं आपल्या अभिव्यक्तीतून उतरत असतं. त्यामुळं ‘एकदा काय झालं!!’ हा सिनेमा दिग्दर्शकाला जगण्याविषयी काय आकलन झालं आहे, यावरही भाष्य करतो. एका सृजनशील कलावंताला झालेलं हे आकलन असल्यानं त्यानं ते कविता, गाणी, संवाद आणि अर्थातच गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं आहे. हे सांगणं ‘ये हृदयीचे ते हृदयी’ असं असल्यानं प्रेक्षकांच्या काळजापर्यंत पोचतंच. (अर्थात देणाऱ्याप्रमाणे ते स्वीकारणाऱ्याची - म्हणजेच बघणाऱ्यांचीही - संवेदनांची पातळीही समान असणं आवश्यक आहे.)
सलीलसारखा कलावंत जेव्हा एखादी कलाकृती तयार करतो, तेव्हा त्याला एकच एक गोष्ट सांगायची नसते. त्या गोष्टीच्या माध्यमातून तो अव्यक्तपणेही अनेक गोष्टी आपल्यासमोर मांडत असतो, सांगत असतो. सलीलच्या या कलाकृतीतही हे सांगणं आहे. ते आपल्या कुटुंबव्यवस्थेविषयी आहे, त्यातल्या आजी-आजोबा, आई-बाबा या  महत्त्वाच्या घटकांविषयी आहे, ते लहानपणी आजी-आजोबा आपल्याला ज्या गोष्टी सांगतात त्याविषयी आहे, कुटुंब आपल्याला काय संस्कार आणि ऊब देतं त्याविषयी आहे, आपल्या सामाजिक भानाविषयी आहे आणि आयुष्यात आकस्मिक येऊन आदळणाऱ्या कुठल्या तरी कठोर गोष्टीच्या समंजस स्वीकाराविषयीही आहे. त्यासाठी त्यानं मुलगा आणि त्याचे वडील या नात्याचा प्रमुख आधार घेतला आहे. मराठी सिनेमांत फार कमी वेळा या नात्याचं इतकं उत्कट दर्शन झालंय. इथं रूढार्थानं नायक-नायिका किंवा हिरो असं कुणी नाही. इथं येणारी विपरीत परिस्थिती,  कठीण काळ आणि त्यानुसार आपापल्या कुवतीनुसार त्याला प्रतिसाद देणारी साधी माणसं आहेत. मात्र, या माणसांकडं शिदोरी आहे ती आपल्या आजी-आजोबांनी किंवा आई-बाबांनी लहानपणी सांगितलेल्या गोष्टींची. या गोष्टींतून आपल्या अबोध मनावर तेव्हा जे काही संस्कार झालेले असतात, तेच शेवटी आपल्याला कठीण प्रसंगांत उभं करतात. एका अर्थानं ही कलाकृती म्हणजे त्या गोष्टी सांगणाऱ्या पिढीला केलेला सलाम आहे.
चिंतन (अर्जुन पूर्णपात्रे) आणि त्याचे बाबा किरण (सुमीत राघवन) या दोघांची ही गोष्ट आहे. किरणची ‘नंदनवन’ ही वेगळ्या धर्तीवरची शाळा आहे. मुलांना रूढ पद्धतीने शिकविण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने शिकवण्यावर त्याचा भर आहे. चिंतन आणि बाबा यांचं एक घट्ट बाँडिंग आहे. लहानग्या चिंतनसाठी बाबाच त्याचा सर्व काही आहे. तोच त्याचा ‘हिरो’ आहे. चिंतनच्या घरात त्याची आई (ऊर्मिला कोठारे) आणि आजी-आजोबाही (सुहास जोशी व डॉ. मोहन आगाशे) आहेत. या घरात अचानक एक भयंकर वादळ येतं आणि सगळ्यांच्याच भावनांची कसोटी लागते. चिंतन या सगळ्या परिस्थितीला कसं तोंड देतो, त्याचे बाबा काय करतात, घरातली मंडळी कशी प्रतिसाद देतात आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे चिंतनने ज्या गोष्टी ऐकलेल्या असतात, त्याचा कसा उपयोग होतो या सगळ्यांची ही गोष्ट आहे.
सिनेमा पाहिल्यानंतर पहिल्यांदा तर मला वाटलं, आपण खरोखर यावर काही लिहू शकत नाही. इमोशनली हा खूप जास्त डोस झाला, असंही मला प्रथम वाटलं. माझ्यासोबत सिनेमा पाहणारे सगळेच नि:शब्द झाले होते. भिजलेले डोळे हीच खरी दाद होती. अर्थात नंतर तो भर ओसरल्यावर सिनेमाबद्दल लिहायलाच हवं असंही वाटलं. सलीलची सर्जक दृष्टी, सुमीत राघवननं साकारलेली अप्रतिम भूमिका, शंकर महादेवन यांचं गायन, सलीलचं संगीत, संदीप खरे-समीर सामंत यांचे शब्द या सगळ्यांच्या मेहनतीतून ही कलाकृती आकाराला आली आहे. (मी कोव्हिडपूर्व काळात या सिनेमाचं चित्रीकरण बघायला एक दिवस गेलो होतो. शूटिंग हे एकूणच किती कंटाळवाणं आणि सर्वांच्या संयमाची परीक्षा बघणारं काम आहे, हे माझं मत त्यानंतर आणखी घट्ट झालं.) 
या सिनेमातल्या गाण्यांचा खास उल्लेख केला पाहिजे. शंकर महादेवन यांच्या आवाजातलं ‘रे क्षणा’ हे गाणं आणि सुनिधी चौहाननं गायलेली अंगाई अगदी जमून आली आहे. ‘भीमरूपी महारुद्रा’ या गाण्यानं सिनेमाची सुरुवात होते आणि ‘मी आहे श्याम, मित्र माझा राम’ हे आणखी एक गाणं यात आहे. ही दोन्ही गाणी सलीलनं आधीच तयार केली होती. त्याचा या सिनेमात चपखल वापर करण्यात आला आहे. रस्त्यावरच्या गरीब मुलाचा आणि पुष्कर श्रोत्रीचा असे दोन छोटे ट्रॅक सिनेमात आहेत. सिनेमा पूर्वार्धात काही ठिकाणी थोडा रेंगाळतो. मात्र, एकूण तो आपली पकड फारशी सोडत नाही. संदीप यादव यांच्या छायांकनाला दाद द्यायला हवी. लहान मुलांच्या नजरेचा ‘अँगल’ त्यांनी अजूक पकडला आहे.
सुमीतसोबतच ऊर्मिला, सुहास जोशी, मोहन आगाशे, पुष्कर श्रोत्री यांच्या भूमिका आहेत आणि त्यांनी त्या व्यावसायिक सफाईनं केल्या आहेत. छोट्या, पण महत्त्वाच्या भूमिकेत मुक्ता बर्वेचं दर्शन सुखकर आहे. चिंतन झालेला अर्जुन पूर्णपात्रे हा मुलगा गोड आहे. त्याची भूमिका अवघड होती. विशेषत: शेवटचा प्रसंग. मात्र, तो त्यानं उत्तम केला आहे. (चाळीसगावची पूर्णपात्रे फॅमिली आपल्याला ‘सोनाली’ सिंहिणीमुळं माहिती आहे. अर्जुन याच घरातला!) 
काही सिनेमे आपल्याला रडायला लावणारे म्हणून अजिबात आवडत नाहीत. ‘एकदा काय झालं!!’ हा याला अपवाद ठरावा. दुसरं म्हणजे हा काही लहान मुलांचा चित्रपट नाही. लहान मुलं असलेला हा मोठ्यांचाच चित्रपट आहे. आपल्यातल्या लहान मुलाची आणि निरागस संवेदनशीलतेची समंजस गोष्ट सांगणारी ही कलाकृती एकदा तरी अनुभवावीच.

---

1 Aug 2022

रोहन मैफल - ‘पेन’गोष्टी - भाग ३ व ४

भाग ३
-------

लेख झाला का?
-----------------

दिवाळी अंकासाठी लेख लिहिणं हा तुम्ही लेखक आहात, या घटनेच्या असंख्य पुराव्यांपैकी एक महत्त्वाचा पुरावा असतो. दिवाळी अंकात लेख लिहिणं ही लेखक म्हणून ओळख होण्यातली एक कसोटी असेल, तर दिवाळी अंकासाठी तुमच्याकडे प्रकाशकाने लेख मागणं, हा लेखक म्हणून प्रस्थापित होण्यातला महत्त्वाचा मानदंड असतो. साधारणत: मृगाचा पहिला पाऊस पडून गेला, की दिवाळी अंक काढणारी संपादक मंडळी एकदम ‘चार्ज’ होतात. त्यांच्या मनातल्या अंकाचा मोर एकदम थुईथुई नाचायला लागतो. (आमच्या एका प्रकाशक मित्राने फेब्रुवारीतच दिवाळी अंकाचा लेख मागितला होता. तेव्हा चालू दिवाळी अंक वाचून संपले, की लिहितो, असं कळवलं होतं.) बाकी ‘या आठवड्यात वाचून टाकू’ म्हणून बाजूला ठेवलेले दिवाळी अंक पुढील ५२ आठवड्यांतही वाचले जात नाहीत, ते वेगळं. दिवाळी अंकात लिहिण्याची एक खास वेळ असते. ती वेळच तुम्हाला हाकारे घालते. गणपती संपले, पितृपंधरवडा सुरू झाला, की हवा बदलते. हीच खरी लेखकाची दिवाळी अंकातले लेख पाडण्याची वेळ असते. काही धोरणी लेखक जानेवारीपासूनच ‘स्टॉक’ करीत जातात. काही हुकमी लेखक विषयाबरहुकूम लेख लिहून ठेवतात. ‘मागणी तसा पुरवठा’ असं त्यांचं तत्त्व असतं. आमच्या एका विनोदी लेखक मित्रानं तर एका पावसाळ्यात ५० लेख लिहून टाकले होते. त्या वर्षी मुठेऐवजी त्याच्या पेनातल्या शाईलाच पूर आला होता, असं वाटून गेलं. आठ-दहा लेख समजू शकतो, अगदी १५ देखील ओकेच; पण पन्नास? त्याच्या या बहुप्रसवा लेखणीनं मला तर भयंकर न्यूनगंड आला होता. सुरुवातीला मी कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या धोरणानुसार ‘एक या दो... बस्स’ म्हणून थांबत असे. ते एक किंवा दोन लेख लिहितानाही पुरेशी दमछाक होई. मात्र, हळूहळू मागणी वाढू लागली. आपल्यासारख्या लेखकाला मागणी वाढली, म्हणजे दिवाळी अंकांची संख्या तरी वाढली असावी किंवा त्यांचा दर्जा तरी घसरला असावा, अशी प्रामाणिक भावना मनात येऊन गेली होती. मात्र, दिवाळी अंक लेखकाला भावना आदी गोष्टींचा फार विचार करून चालत नाही. मृग नक्षत्र उलटलं, की ‘लेख झाला का?’ असे धमकीवजा संदेश संपादक मंडळींकडून येऊ लागतात. ‘अहो, काय घाई आहे? देतो पुढच्या महिन्यात...’ असं उत्तर दिलं, की ‘सगळा अंक लावून तयार आहे, फक्त तुमचाच लेख यायचाच राहिला आहे,’ असं धादांत असत्य उत्तर तुमच्या तोंडावर फेकून ही मंडळी मोकळी होतात. खरं काय ते दोघांनाही माहिती असतं. काही संपादक मंडळी अगदी टोक गाठतात. (पूर्वी संपादक मंडळी लेखकाच्या लेखाला टोक वगैरे आहे का, हे तपासत असत. नसेल तर काढून देत असत. आता ती ‘मौज’ संपली. आता हे दुसरं टोक!) मग, पंधरा ऑगस्टच्या आत लेख आला पाहिजे, अशी प्रेमळ धमकी येते. बहुतेक संपादक-प्रकाशकांची ही आवडती, लाडकी डेडलाइन आहे. लेखकाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावून घेण्यासाठी त्यांना ‘१५ ऑगस्ट’ हाच दिवस सुचावा? या काळात फोन वाजला किंवा मेसेजची रिंग वाजली, तरी धडकी भरते. ‘लेख झाला का?’ हा प्रश्न हृदय भेदून जातो. लेख झालेला नसतोच. मग ‘झालाच आहे, एकदा परत वाचतो आणि पाठवतो,’ अशी काही तरी पळवाट काढावी लागते. लेख युनिकोडमध्ये हवा, मेलवर हवा, सोबत फोटोही तुम्हीच जोडा, या आणि अशाच अनेक अटी-शर्तींची पूर्तता करावी लागते. कशीबशी ही डेडलाइन गाठून आपण ‘हुश्श’ केलं, की आणखी एका संपादकाची मेल इनबॉक्सात येऊन पडलेली असते.
काही मंडळी दर वर्षी अंक काढतात. मात्र, गणपती जाईपर्यंत यंदा अंक काढायचा की नाही, हेच यांचं निश्चित झालेलं नसतं. सगळं ऐन वेळी ठरतं. मग अचानक लेखाची मागणी येते. ‘तुम्हाला आवडेल त्या विषयावर द्या,’ असा संदेश आला, की समजायचं, आपल्या मजकुराचं महत्त्व दोन जाहिरातींच्या मध्ये लावायचा काही तरी मजकूर इतकंच आहे. अशा मंडळींनाही मग सस्त्यातले (अर्थात आधी कुठं तरी छापून आलेले किंवा ब्लॉगवरचे) तयार लेखच पाठवले जातात, हे सांगणे न लगे!
काही संपादक वा प्रकाशकांना एखाद्या विषयाला वाहिलेला अंक काढायची खोड असते. अत्यंत विवक्षित व नेमका विषय देण्यात ही मंडळी पटाईत असतात. उदा. चित्रपटसृष्टी असा ढोबळ विषय न देता ‘विसाव्या शतकातील सातव्या दशकातील सिंधी चित्रपटांतील स्वयंपाकघरे’ असा अतिनेमका विषय देतील. आता सांगा, ढोबळ विषयात लेखकाला जशी चौफेर फलंदाजी करता येते, तशी या नेमक्या विषयात करता येईल का? उगाच अभ्यास वगैरे नाही का करावा लागणार? अशा बाउन्सी विकेटवर खेळण्यापेक्षा ‘यंदा मी फार बिझी आहे हो’ असे सांगून चेंडू सोडून देणे फार सोपे! मग काही हौशा-नवशा-गवशा मंडळींचेही फोन सुरू होतात. त्यांना टाळता टाळता नाकी नऊ येतात. अखेर दिवाळी येते. आपण लेख लिहिलेले अंक बाजारात येतात. आपण प्रतिसादाची आणि मानधनाची वाट बघत राहतो. कुठून तरी महाराष्ट्रातल्या आडगावातून एखादे दिवशी फोन येतो आणि लेख आवडल्याचं समोरची व्यक्ती सांगते, तेव्हा तो लेख लिहिल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. मानधनाची मात्र वाटच बघायची असते. तोवर आपण पुन्हा मान खाली खालून पुढच्या फोनची वाट बघत राहतो...


---

भाग ४
--------

दिवाळी अंकांची धूम
-------------------------

दिवाळीची चाहूल दोन गोष्टींनी लागते. एक तर पावसाळा संपून हवेत हलका गारवा यायला लागलेला असतो, आणि दोन, दिवाळी अंकांच्या जाहिराती प्रसिद्ध व्हायला लागलेल्या असतात. गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून मराठी माणसाची दिवाळी या खास खास दिवाळी अंकांनी खरोखर समृद्ध होत आलेली आहे. मराठी माणसाच्या काही खास, वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहेत. त्यात दिवाळी अंक ही महत्त्वाची. दिवाळी हा मुळातच वर्षातला सर्वांत मोठा सण असल्यानं या काळात हात सैल सोडून खरेदी होत असतेच. त्यात आवडीचे दिवाळी अंक आणि सोबत पुस्तकांचीही खरेदी होतेच. बहुसंख्य सुशिक्षित मराठी कुटुंबांमध्ये ही परंपरा दीर्घकाळ चालत आलेली आहे. दिवाळीच्या सुट्टीत या अंकांचं वाचन हा फार मोठा आनंदसोहळा असायचा. अलीकडच्या २०-२५ वर्षांत त्यात ‘दिवाळी पहाट’ नावाच्या उपक्रमाची भर पडली आहे. अशा एखाद्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावायची, नंतर चविष्ट फराळाचा फन्ना उडवायचा आणि मग आवडता दिवाळी अंक वाचत दुपारी लोळत पडायचं, हा अनेकांचा आजही दिवाळातला ठरलेला कार्यक्रम आहे.
मराठीत विपुल प्रमाणात दिवाळी अंक निघतात. नामवंत आणि वर्षानुवर्षं प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांची संख्या साडेतीनशे ते चारशेच्या आसपास आहे. याशिवाय गावोगावी निघणारे अंक धरले तर ही संख्या दीड-दोन हजारांच्या घरात सहज जाईल. नियमित निघणारे नेहमीचे अंक म्हटले, तरी वर्षानुवर्षं हे अंक निघत आलेले आहेत, यातलं सातत्य वाखाखण्याजोगं आहे. या दिवाळी अंकांमधून दर्जेदार कथा, कविता आणि कादंबऱ्याही वाचकांना वाचायला मिळाल्या आहेत. अनेक मोठमोठ्या लेखकांची सुरुवात दिवाळी अंकांतून लेख लिहूनच झाली आहे. मराठीत कवींचं उदंड पीक बारमाही येत असतं, त्याला कारण त्यांच्या कविता प्रसिद्ध करणारे असे शेकडो अंक निघत असतात. माझ्या लहानपणी लायब्ररीतूनच दिवाळी अंक आणून वाचायची पद्धत होती. फारच थोडे अंक विकत घेतले जात. त्यातही ‘आवाज’सारख्या विनोदी अंकावर वाचकांच्या उड्या पडत. त्यातल्या त्या चावट ‘खिडक्यां’चं आकर्षण बरेच दिवस होतं. विनोदी अंकांखालोखाल मागणी असायची ती भविष्यविषयक दिवाळी अंकांना. त्यानंतर मग दैनिकांनी काढलेले दिवाळी अंक आणि नंतर विशिष्ट विषयांना वाहिलेल्या अंकांचा नंबर लागत असे. या दिवाळी अंकांना पुढंही जवळपास सहा महिने भरपूर मागणी असे. त्यानंतर मग जुन्या झालेल्या अंकांचीही मित्रमंडळींत देवाणघेवाण चाले.
दिवाळीत मित्रांकडं फराळाला जाणं हा एक सोहळा असायचा. यात रंगणाऱ्या गप्पांमध्येही यंदाच्या दिवाळी अंकांत कुणी काय बरं लिहिलं आहे, याच्या चर्चा रंगत असत. हल्ली या चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसतात. काळ बदलला आहे, तसं तंत्रज्ञानही बदललं. ई-पुस्तकांप्रमाणे आता डिजिटल दिवाळी अंकही निघू लागले आहेत आणि ते व्हॉट्सअपवर जोरदार फॉरवर्डही होत असतात. गेल्या वर्षी करोनामुळं निर्माण झालेल्या अतिबिकट परिस्थितीत काही दिवाळी अंक निघू शकले नाहीत. मात्र, बहुतेकांनी जिद्दीनं आपापले अंक काढलेच. काहींनी केवळ ऑनलाइन अंक प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. वाचकांना हा बदल स्वीकारणं जड केलं असलं, तरी दिवाळी अंक आले याचंच अनेकांना कौतुक वाटलं. प्रकाशकांच्या मागे काही कमी व्याप नसतात. लेख गोळा करणं, त्यांचं उत्तम संपादन करणं, नंतर आर्टिस्टकडून ती पानं लावून घेणं, चांगलं मुखपृष्ठ निवडणं, आतली पानं कलात्मक पद्धतीनं सजवणं हे सगळं वेळखाऊ काम आहे. मुळात अंगी किडाच असायला लागतो. त्याशिवाय हे काम उरकत नाही. आपल्याकडं अशा हौशी मंडळींची मुळीच कमतरता नाही, ही फार चांगली गोष्ट आहे.
यंदा तुलनेनं करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं सर्व काही पूर्ववत सुरू होताना दिसतं आहे. त्यामुळं यंदा पूर्वीप्रमाणेच जोरदार सर्व अंक बाजारात येणार याची खात्री वाटते. मराठीच्या साहित्य व्यवहारात जसं साहित्य संमेलनाचं एक महत्त्व आहे, तसंच महत्त्व या दिवाळी अंकाचंही आहे. या काळात होणारी आर्थिक उलाढाल मराठी प्रकाशन व्यवसायासाठी प्राणवायूसारखीच मोलाची असते. यानिमित्ताने होतकरू लेखक मंडळींनाही मानधनाच्या रूपाने चार पैसे मिळतात. (अनेकांना केवळ ‘मान’ मिळतो; ‘धन की बात’ मनातच ठेवावी लागते, हीदेखील वस्तुस्थिती आहेच.) मात्र, बहुतेक नामवंत प्रकाशक आपल्या लेखकांना यथोचित मानधन देतात. अंकातील जाहिराती आणि मजकूर यांचं संतुलनही त्यांनी राखलेलं असतं. त्यामुळं हे अंक वाचताना मजा येते.
या साहित्य व्यवहारातून अनेक चांगल्या निर्मितीची बीजं रोवली जातात. नवे लेखक मिळतात. प्रकाशकही चांगल्या आशयाकडं लक्ष ठेवून असतात. एखाद्या नव्या पुस्तकापेक्षाही एखाद्या लोकप्रिय दिवाळी अंकाचा प्रसार किती तरी जास्त असतो. अशा अंकात लिहिलेल्या लेखावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रतिसाद येतो, असा अनुभव आहे. महाराष्ट्राबाहेरही जिथं जिथं मराठी माणूस वस्ती करून आहे, त्या शहरांतूनही या अंकांना मागणी असते. तिथले वाचकही आवर्जून प्रतिसाद कळवत असतात. एकूणच मराठी माणसाच्या अनेक उत्साही, हौशी गोष्टींपैकी दिवाळी अंक ही एक ठळक गोष्ट आहे. आता दिवाळीत पुन्हा एकदा हौसेनं दिवाळी अंकांची चळत आणायची आहे, याची खूणगाठ अनेकांनी बांधली असेल. त्या खरेदीसाठी शुभेच्छा! दिवाळीप्रमाणेच दिवाळी अंकांचे वाचनही शुभदायी ठरो!

---