29 Apr 2017

बाहुबली-२ रिव्ह्यू

'चांदोबा'तली गोष्ट
---------------------


'बाहुबली-२' जसा अपेक्षित होता, तसाच निघाला. बाहुबलीचे दोन्ही भाग मला आवडले. आपल्यापैकी अनेकांना आवडतीलच. लहानपणी 'चांदोबा'च्या गोष्टी आपल्याला वाचायला आवडायच्या. परिराज्याची सफर घडविणाऱ्या या गोष्टी आपल्या लहानपणीचा अनमोल ठेवा आहेत. या गोष्टींनी आपलं बालपण मजेत घालवलं. कोऱ्या कॅनव्हासवर अगदी साध्या जीवनमूल्यांच्या रंगरेषा उधळल्या. ही जीवनमूल्यं साधीच होती, पण जगण्यासाठी महत्त्वाची होती. थोरांचा मान राखावा, नेहमी खरे बोलावे, मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये, राजाने नेहमी रयतेचे कल्याण करावे ही त्या साध्या-सोप्या जगण्यातली तेवढीच साधी-सोपी, पण खरी खरी मूल्यं होती. अर्थात प्रत्येक गोष्टीला काही तरी तर्काचं वा मूल्यशिक्षणाचं अधिष्ठान पाहिजेच असंही नसायचं. काही गोष्टी निखळ करमणुकीच्या असायच्या. त्यात मग पऱ्यांची नगरी, जादूची छडी, जादूचा शंख, उडती चटई, गुहेतला राक्षस असे सगळे असायचे. या गोष्टी वाचताना मन त्यात रमून जायचं. आता वयानं मोठे झालो, तरी अशा गोष्टी चुकून कुठं वाचायला मिळाल्या, तरी त्या आवडतातच. याचं कारण त्या आपले हरवलेले दिवस कुठं तरी पुन्हा मनात जागवतात. नॉस्टॅल्जिया आपल्याला परमप्रिय आहे. या नॉस्टॅल्जिक मनांना योग्य ते अन्न पुरवण्याचं काम अशा गोष्टी करत असतात. मोठे होऊनही आपण मनात शैशव जपलं तर मग अशा गोष्टी मोठेपणीही आवडतातच.
'बाहुबली'चे दोन्ही भाग म्हणजे अशीच परिकथा आहे. ती बघताना सिनेमा पाहतानाचे रूढ चष्मे काढून ठेवावेत. वयानं दहा-बारा वर्षांचं व्हावं आणि समोर चाललेली जादुई सफर मस्त एन्जॉय करावी. पावणेतीन तास वेगळ्या दुनियेत हरवून जावं. लहान झालं, की मग तर्काचं इंद्रिय आवरतं घ्यावं. सगळेच सिनेमे आपल्याला अशी संधी देत नाहीत. 'बाहुबली' देतो, याचं कारण त्याची भव्यता. दिग्दर्शक एस. एस. राजामौलीनं अत्यंत आत्मविश्वासानं आणि मेहनतीनं हा सिनेमा साकारलाय. भव्यता आणि तंत्रकुशलता यात हा सिनेमा कुठल्याही हॉलिवूडपटापेक्षा कमी नाही. 'हॅरी पॉटर'चे सगळे भाग आपल्याला आवडतात किंवा जगभरच ते पाहिले जातात. तसाच 'बाहुबली' हा या मातीतला, अद्भुतरम्य सिनेमा आहे.
कटप्पानं बाहुबलीला का मारलं या प्रश्नापाशी गेल्या वेळचा सिनेमा थांबला होता. या वेळचा सिनेमा त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी फ्लॅशबॅकमध्ये जातो. एका अर्थानं हा पहिला भाग आहे. सिनेमाच्या अगदी शेवटी तो गेल्या भागाशी कनेक्ट होतो आणि तिथून पुढंही अर्धा तास चालतो. एकूण दोन तास ४७ मिनिटं चालणारा हा महासिनेमा शेवटी थोडा ताणल्यासारखा झालाय. किमान दहा ते १५ मिनिटं तरी तो कमी करता आला असता. कटप्पानं बाहुबलीला (म्हणजे थोरल्या बाहुबलीला - अमरेंद्र बाहुबली) का मारलं याचं समाधानकारक उत्तरही हा भाग देतो. मुख्य म्हणजे यात कुठलंही गिमिक नाही किंवा त्याबाबत ज्या काही चर्चा सुरू आहेत, त्या खोट्या आहेत हे यातून स्पष्ट होतं. थोरला बाहुबली खरंच कटप्पाच्या हातून मरतो आणि म्हणूनच त्याचा मुलगा - महेंद्र बाहुबली (ज्याची संपूर्ण गोष्ट पहिल्या भागात आली आहे) भल्लालदेवाचा सूड उगवतो, अशी ही साधी-सरळ कथा आहे.
पहिल्या भागात तो महाप्रचंड धबधबा, शिवगामीदेवीचं ते लहान बाळाला वाचवणं, मग शिवाची प्रेमकथा वगैरे भाग फारच भव्यपणे समोर आला होता. या भागात पहिल्या भागात तुलनेनं तेवढा भव्यपणा नाही. सुरुवातीचा हत्तीचा प्रसंग एक तसा आहे. मात्र, नंतर सिनेमा थोरल्या बाहुबलीच्या प्रेमकथेकडं वळतो. गेल्या भागात साखळदंडानं जखडून ठेवलेल्या देवसेनेचा पूर्वेतिहास या भागात नीट कळतो. अमरेंद्र बाहुबली व कटप्पा देशाटन करीत असताना त्या कुंतल देशात जातात आणि तिथं त्यांना देवसेना दिसते. हा सर्व कथाभाग हलक्या-फुलक्या पद्धतीनं आपल्या समोर येतो. देवसेनेसमोर बाहुबली आधी मंदबुद्धी असल्याचं नाटक करतो आणि मग नंतर तिला खरं काय ते कळतं. मग कथेला अचानक एक ट्विस्ट मिळतो आणि बाहुबलीला व्हायचा राज्याभिषेक भल्लालदेवाला करावा, असा आदेश शिवगामीदेवी देते. बाहुबली काही तत्त्वांसाठी राजा होण्याचा प्रस्ताव नाकारतो. पुढेही तो आपल्या या तत्त्वांशी ठामच राहतो आणि शेवटी त्यासाठी जीवाचं मोल देतो. भल्लालदेव व त्याच्या पित्याची कारस्थानं सदैव चालू राहतात आणि त्यातूनच जे घडू नये ते घडतं.
हे सर्व येतं अत्यंत भव्य-दिव्य स्वरूपात... अमरेंद्र बाहुबली आणि देवसेनेचा रोमान्स आणि त्यांची धनुष्यबाणाची लढाई हा सर्व प्रकार जमून आलेला. कुंतलदेशातील लढाईच्या वेळी धरण फोडण्याचा आणि शेवटी नारळाची झाडं वाकवून माहिष्मतीच्या उंच उंच भिंतींवरून आत जाण्याची कल्पनाही गमतीशीर. पहिल्या भागात येणारी एक-दोन गाणी जरा कंटाळवाणी आहेत. मात्र, एकूण परिणाम डोळे दिपवणारा आणि स्तिमित करणारा असाच.
प्रभास आणि राणा दुगुबत्ती या दोन्ही अभिनेत्यांनी यात जबरदस्त काम केलंय. प्रभास अमरेंद्र बाहुबलीच्या रूपात जास्त आवडला व लोभस वाटला. त्या मानाने तरुणपणीची देवसेना काही एवढी खास वाटत नाही. शिवगामी झालेल्या रम्या कृष्णन या अभिनेत्रीनं अत्यंत दमदार काम केलंय. तिचा मुद्राभिनय पाहण्यासारखा. कटप्पा झालेला सत्यराज हा दक्षिणेकडचा सुपरस्टार अभिनेता आहे. हे लक्षात घेता, संपूर्ण सिनेमातच त्याला मिळालेलं एवढं फुटेज का मिळालं आहे, हे लक्षात येईल. पण सत्यराज यांनी कटप्पा प्रभावीपणे साकारला आहे, यात शंका नाही. भल्लालदेवच्या कारस्थानी पित्याच्या भूमिकेत नासर यांनी कमाल केली आहे. किंबहुना व्हीएफएक्स किंवा तंत्राच्या करामतीत या सिनेमात या सगळ्या लोकांचा अभिनय लक्षात राहतो, ही गोष्टच त्यांच्या अभिनयक्षमतेला दाद द्यावी अशी आहे. दिग्दर्शकानंही एकूणच हा भाग अधिक 'मानवी' करण्याकडं भर दिलाय हे जाणवतं. तरीही शेवटी ती परिकथा आहे. त्यामुळं यात प्रभासचा बाहुबली रजनीकांत स्टाइल अशक्य गोष्टी सहज करताना दिसतो, यात आश्चर्य वाटत नाही. किंबहुना एवढ्या मोठ्या सुपरहिरोकडून तीच तर अपेक्षा आहे. त्यामुळंच भल्लालदेवाच्या भव्य सुवर्णपुतळ्याच्या खाली चाललेली त्यांची मारामारी पाहताना आपल्याही मुठी वळल्या जातात.
अशा सिनेमात आपणही एक पात्र म्हणून प्रवेश केला, तर तो बघण्याची गंमत वाढते. सध्या सुट्ट्या सुरू असताना आपल्यालाही 'लहान मूल' होण्याची संधी या सिनेमानं दिली आहे. ती साधायलाच हवी.
---
दर्जा - चार स्टार
---

28 Apr 2017

विनोद खन्ना लेख

देखणा... 
-----------



विशेषणांचीही गंमत असते. कपड्यांप्रमाणेच ती नीट अंगाला बसावी लागतात; अन्यथा बोंगा होतो. ‘देखणा’ हे विशेषण ज्याच्यासाठीच जणू जन्माला आलं असावं, असं वाटायचं असा विनोद खन्ना गेला. आपल्या चित्रपटसृष्टीत ‘माचो’ पुरुषांची कमतरता नव्हती आणि नसेल; पण मर्दानी रांगडेपणासोबतच देखणेपणाचं देणं फार थोड्यांना लाभतं. विनोद खन्ना तसा होता. स्त्रियाच काय, पण पुरुषांनाही हेवा वाटावा असं काही तरी त्याच्या व्यक्तिमत्त्वात होतं. शरीरसंपदेकडं जरा दुर्लक्षच करणाऱ्या भारतीय जनमानसासाठी देखणे स्त्री-पुरुष ही दिवसाही स्वप्नात पाहण्याची चीज होती, त्या काळात विनोद खन्ना आपल्यासमोर आला. अप्राप्य सौंदर्याची आसक्ती अफाट असते. त्यामुळं मधुबाला, नूतन, वहिदा यांनी तत्कालीन पुरुषांच्या काळजाचं जे केलं, तेच देव आनंद, राज कपूर, धर्मेंद्र, अमिताभ, विनोद खन्ना यांनी स्त्रियांच्या काळजाचं केलं. या सर्वांतही विनोद खन्ना वेगळा होता. याचं कारण एखाद्या ग्रीक देवतेसारखा दिसणारा हा पीळदार शरीराचा देखणा पुरुष रूपेरी पडदा व्यापून पाहणाऱ्याच्या मनात उतरायचा. त्याला पाहिल्याबरोबर प्रथम नजरेत भरायचा तो त्याचा पुष्ट देह. साडेसहा फुटांची उंची, दणकट बाहू, रुंद छाती, कपाळावर येणारे भरघोस केस असा हा पंजाबी मातीतला रांगडा गडी संधी मिळताच चित्रपटसृष्टीत हिरो होणार यात नवल नव्हतंच... पण विनोद खन्नाच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी अशा सरळ घडायच्या नव्हत्या...
खलनायक म्हणूनच त्याला पहिल्यांदा पडदा बघावा लागला. ‘मेरा गाँव मेरा देश’मधला त्याचा जब्बारसिंह रूढार्थानं खलनायक असला, तरी विनोद खन्नाचा देखणेपणा त्या भूमिकेतही सगळ्यांना जाणवून गेला. त्यापूर्वीही दुय्यम भूमिका किंवा नकारात्मक भूमिका करीत त्याला दोन-तीन वर्षे काढावी लागली. विनोद खन्नाचा जन्म १९४६चा. तो पहिल्यांदा चित्रपटात झळकला बाविसाव्या वर्षी म्हणजेच १९६८ मध्ये. हा काळ हिंदी चित्रपटसृष्टीतील राज कपूर-दिलीपकुमार व देवआनंद या लोकप्रिय त्रयीच्या संधीकालाचा होता. याच काळात धर्मेंद्र, सुनील दत्त, राजेंद्रकुमार आणि एक-दोन वर्षांच्या कालावधीत शत्रुघ्न सिन्हा, राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांचा एक तर उदय झाला किंवा ते हळूहळू मोठे स्टार होत गेले. विनोद खन्नाही याच काळात चित्रपटांत आला. दैवदत्त देखणेपण असूनही त्याचा पटकन जम बसला नाही. काही काळ संघर्ष करावा लागला. अखेर गुलजार यांच्या ‘मेरे अपने’ (१९७३) आणि ‘अचानक’नं विनोद खन्नाला नायक म्हणून सूर गवसला. यातला ‘अचानक’ तर प्रसिद्ध नानावटी खटल्यावर आधारित होता. याच खटल्यावर आधारित गेल्या वर्षी आलेल्या ‘रुस्तुम’ने अक्षयकुमारला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. ‘अचानक’ किती तरी सरस असूनही विनोद खन्नाच्या वाट्याला हे भाग्य आलं नाही. नंतर आलेला त्याचा ‘इम्तिहान’ (१९७४) गाजला. यातल्या तत्त्वनिष्ठ प्राध्यापकाची भूमिका विनोदनं कमाल साकारली होती. ‘रुक जाना नहीं तू कभी हार के’ हे  या सिनेमातलं किशोरकुमारचं गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत १९७३ नंतर अमिताभ नावाचं पर्व सुरू झालं होतं. राजेश खन्ना अधिकृत व एकमेव सुपरस्टार होता. या दोघांचाही चाहतावर्ग दिवसागणिक वाढत होता. अशा काळात विनोद खन्नाला स्वतःचं स्थान निर्माण करायचं होतं. 
त्याच्याकडे असलेलं जन्मजात व अप्राप्य देखणेपण हीच त्याची एकमेव जमेची बाजू होती, हे निर्विवाद. विनोद खन्नाचा विवाह १९७१ मध्येच झाला होता. पुढच्या काळात अनेक नामवंत नायिकांसोबत त्यानं काम केलं; मात्र कुठल्याही नटीसोबत त्याच्या नावाची चर्चा कधी ऐकू आली नाही. त्या काळात एका सिनेमात दोन किंवा तीन हिरो सर्रास असायचे. शशी कपूर व अमिताभ, अमिताभ व विनोद खन्ना, राजेश खन्ना व अमिताभ असे दोन किंवा तीन हिरो सहजच एका चित्रपटात दिसायचे. विनोद खन्नानेही सोलो हिरो म्हणून भूमिका केल्या, तशाच या मल्टिस्टार चित्रपटांतही तो सहजतेनं वावरला. ‘अमर, अकबर, अँथनी’ हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्यानंतर ‘मुकद्दर का सिकंदर’ही! याच काळात राजेश खन्नाचा हळूहळू अस्त होत चालला होता. पुढचा सुपरस्टार कोण, याच्या चर्चा चित्रपटसृष्टीत रंगत असताना अमिताभला विनोद खन्नाची सशक्त स्पर्धा होती, हे स्पष्ट दिसत होतं. मात्र, वर म्हटलं तसं विनोद खन्नाचं नशीब सरळ कधी वागलं नाही. त्याचा फिरोझ खानसोबतचा ‘कुर्बानी’ सुपरहिट ठरला असतानाही विनोद मात्र चित्रपटसृष्टीतून एकाएकी गायब झाला. वैयक्तिक आयुष्यात एकापेक्षा एक दुःखाचे आघात सोसावे लागलेल्या विनोदला आचार्य रजनीश (नंतर ओशो) यांच्या तत्त्वज्ञानाची भुरळ पडली. विनोदनं चित्रपटसृष्टीतून चक्क संन्यास घेतला व तो पुण्याला ओशो आश्रमात येऊन राहिला. ‘हाजीर तो वजीर’ हा चित्रपटसृष्टीचा नियम असल्यानं विनोद खन्नालाही सगळे विसरले. त्याच्या सुपरस्टारपदाची चर्चाही थांबली. 
 विनोद खन्ना पाच वर्षांनी परत आला. ‘इन्साफ’ आणि ‘सत्यमेव जयते’ हे दोन चित्रपट त्यानं केले. त्याचं देखणेपण कायम असलं, तरी माणूस म्हणून तो अंतर्बाह्य बदलला होता, हे जाणवत होतं. पुढच्या वीस वर्षांपर्यंत म्हणजे अगदी परवा त्याचा आजारपणाचा फोटो व्हायरल होईपर्यंत सगळा प्रवास उताराकडचाच होता... खरं तर ‘दबंग’मध्ये तो सलमानच्या वडिलांच्या भूमिकेत दिसला, तेव्हा छान वाटलं होतं पाहताना...अमिताभसारखी उत्तम भूमिकांची त्याची ‘सेकंड इनिंग’ पाहायला मिळेल, असं वाटून गेलं होतं. पण ते व्हायचं नव्हतं!
प्रत्येक व्यक्तीला या जगात काही विशिष्ट काम करण्यासाठी ओळखलं जातं. त्यासाठीच ती व्यक्ती भूतलावर अवतरली आहे, असं वाटून जातं. विनोद खन्ना म्हणजे भारतीय पुरुषांच्या मर्दानगीचं व देखणेपणाचं मूर्तिमंत स्वप्न होतं. पूर्वी टीव्हीवर सिंथॉलच्या जाहिरातीत घोड्याबरोबर धावणारा विनोद खन्ना पाहताना अनेक स्त्रियांच्या (अन् पुरुषांच्याही) काळजात एक गोड कळ उठायची. त्या कळीवर फक्त विनोद खन्नाचाच स्टॅम्प होता... आपलं काळीज धडधडतंय तोवर हा स्टॅम्पही कायमच राहणार! अलविदा...
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, २८ एप्रिल २०१७)
-------

विनोद खन्नाची सिंथॉलची जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

https://www.youtube.com/watch?v=rSqaoQBgacY


---

19 Apr 2017

बेगम जान रिव्ह्यू...

बाईचं रक्त...
---------------

 
काही काही सिनेमे प्रेक्षकांकडून काही अधिकची अपेक्षा करतात. 'बेगम जान' हा श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित नवा हिंदी सिनेमाही प्रेक्षकांकडून प्रगल्भ प्रतिसादाची अपेक्षा ठेवतो. 'बेगम जान' पाहताना काही तरी तुटल्याची जाणीव सदैव आतून हादरा देत राहते. किंबहुना अशी जाणीव होत राहावी या हेतूनेच सगळ्या सिनेमाची रचना केल्याचे दिसते. या सिनेमाला असलेली फाळणीची पार्श्वभूमी या तुटलेपणाची जाणीव आणखी अधोरेखित करत राहते. हा सिनेमा फाळणीवरचा नाहीच. तो बेगम जान या स्त्रीचा आहे, त्याचबरोबर यातल्या अम्माचा आहे, रुबिनाचा आहे, गुलाबोचा आहे, जमिलाचा आहे, लताचा आहे, अंबाचा आहे, मैनाचा आहे, राणीचा आहे.. अन् छोट्याशा शबनमचाही आहे... आणि सिनेमाच्या सुरुवातीला येणाऱ्या दृश्यातील २०१६ मधल्या दिल्लीतील बसमध्ये चार-पाच लांडग्यांच्या तावडीत सापडलेल्या आजच्या तरुणीचाही आहे...!
या सगळ्या बायका काही तरी सांगताहेत... रक्ताळून सांगताहेत, आक्रंदून सांगताहेत... छातीचा उभार आणि योनीच्या पोकळीपलीकडची 'बाई' कधीच न दिसणाऱ्या प्रचंड मोठ्या मानवी समूहासाठी फार कळकळीनं काही तरी सांगताहेत...
पहा... ती ऐंशी वर्षांची म्हातारी थंडपणे दिल्लीतल्या त्या लांडग्यांसमोर अंगातले सगळे कपडे उतरवतेय... तीच म्हातारी जेव्हा दहा वर्षांची मुलगी असते तेव्हा तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यासमोर आपल्या आईची अब्रू वाचवण्यासाठी हेच करत होती.... (अर्थात तेव्हा तिचं ते कृत्य पाहून पश्चात्ताप पावणारा पोलिस अधिकारी होता, आता काय होईल हे माहिती नाही!)... खुद्द बेगम जान राजाच्या मर्जीसाठी सर्वांत लहान मुलगी त्याच्यासाठी नैवेद्यासारखी पेश करताना, त्यानं ग्रामोफोन आणला नाहीय म्हणून स्वतः गाणं गायला बसते, तेव्हा आतडं पिळवटून टाकतेय... सुरजितचं प्रेम समजावून घेणारी रुबिना आपल्या छातीवर, खाली त्याचा हात ठेवून त्याला काही तरी फार थोर सांगतेय.... मास्टरवर प्रेम करणारी गुलाबो शेवटी त्याच्याकडूनही विकली जाते, तेव्हा दोन दांडग्यांच्या खाली जाताना काळीज हादरवणारी अस्फुट किंकाळी फोडतेय... लहान वयात कोठ्यावर आलेली शबनम शून्यात बघत असते अन् बेगम जानकडून सात-आठ लागोपाठ मुस्कटात खाल्ल्यावर जेव्हा फुटते, तेव्हा त्या दोघीही काही तरी सांगून जाताहेत... 'महिना याद मत दिलाओ साहब, हर बार आता है और लाल कर जाता है...' म्हणत मोजणी अधिकाऱ्याला घालवून देणारी बेगम जान आतून आतून बोलतेय... लाडक्या कुत्र्याचं मांस कुणी तरी जेवणात कालवून घालतं तेव्हा भडभडून उलटी करणारी बेगम जान सगळ्या देहातून काही तरी सांगतेय...
असं हे रक्तरंजित आक्रंदन आहे... कोठ्यावरच्या बायका आणि देशाची फाळणी हा तेव्हाच्या काळातील तुटलेपणाचा सर्वोच्च परिपाक मानायला हरकत नसावी. पण हा सिनेमा काळाचा संदर्भ सोडूनही काही सार्वकालिक भाष्य करतो, म्हणूनच तो वेगळा ठरतो. तो सांगतो, स्त्रीच्या आत्मभानाची गोष्ट! स्त्रीच्या देहाचा आदर करा, अशी शिकवण नकळत सदैव सांगत राहतो. झाशीच्या राणीपासून रजिया सुलतानपर्यंतच्या सर्व खंबीर स्त्रियांचे संदर्भ अम्माच्या गोष्टींच्या रूपानं सदैव समोर पेरत राहतो. हा सिनेमा केवळ प्रौढांसाठीचा आहे, पण तो केवळ वयानं नव्हे, तर अकलेनंही वाढ झालेल्यांनी पाहावा असाच आहे. याचं कारण यातल्या बायकांचं दुःख, वेदना समजावून घेण्यासाठी लागणारी कुवत किमान ३५-४० पावसाळे पाहिल्याशिवाय येणं कठीण आहे.
विद्या बालननं साकारलेली बेगम जान पाहणं हा खरोखर विलक्षण आनंद आहे. विद्याची अभिनयक्षमता जबरदस्त आहे, हे वाक्य आता लिहिण्याचीही गरज नाही. विद्या ही विद्या आहे आणि म्हणूनच 'बेगम जान' उभी आहे... अर्थात या सिनेमात बेगम जानची स्वतःची स्टोरी अजून यायला हवी होती, असं वाटत राहतं... पण तो फार मोठा दोष नव्हे. सिनेमाची भाषा टोकदार, थेट आहे. एकूणच प्रभाव गडद करण्यासाठी दिग्दर्शकानं भाषेपासून ते नेपथ्यापर्यंत आणि वेषभूषेपर्यंत सगळीकडं हे टोक गाठलं आहे. पण ते बहुतांश प्रभावीच ठरतं.
बाकी गौहर खान, पल्लवी शारदा या दोघींनीही खूप चांगलं काम केलं आहे. इला अरुण अम्माच्या भूमिकेत परफेक्ट. आशिष विद्यार्थी आणि रजत कपूर भारतीय व पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत. त्यांचे हाफ क्लोजअप वगैरेची चर्चा भरपूर झाली असली, तरी तो प्रयोग एकूण ठीकच आहे. नसीरुद्दीन शाह राजाच्या छोट्याशा भूमिकेतही छाप पाडून जातात. त्यांचा मुद्राभिनय बघण्यासारखा... 
 या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे यात आशा भोसलेंनी दीर्घ काळानंतर केलेलं पार्श्वगायन. 'प्रेम में तोहरे' हे आशाबाईंनी गायलेलं गाणं अप्रतिम. वयाच्या ८४ व्या वर्षीही आशाबाईंचा आवाज कसला भारी लागला आहे! बेगम जानच्या अनुभवी, मुरलेल्या स्त्रीत्वाला आशाबाईंखेरीज दुसऱ्या कोणाचा आवाज सूट होणार? या निवडीबद्दल दिग्दर्शकाला खरोखर दाद दिली पाहिजे. चित्रपट संपतो, तेव्हा 'वो सुबह कभी तो आएगी' हे 'फिर सुबह होगी' (१९५८) मधलं मूळ मुकेश व आशाबाईंनी गायलेलं गाणं श्रेया घोषाल अन् अरिजितच्या आवाजात ऐकायला मिळतं. या गाण्यानं शेवट करणं हाही दिग्दर्शकाचा मास्टरस्ट्रोक आहे. त्याला काय सांगायचं आहे, हे सगळं शेवटी त्यात येतं. 'हंसध्वनी'तल्या बासरीची सुरावट हुरहुर लावत असतानाच सिनेमा संपतो...
आपण सिनेमा संपल्यानंतर आधीचे राहिलेले नसतो. आपण स्त्री नावाच्या अथांग महासागराबाबतच्या किंचित अधिक जाणिवेनं समृद्ध झालेलो असतो...
बाईचं रक्त - मग ते कोणत्याही कारणानं का निघेना - तुम्हाला नव्यानं घडवतं, जोडतं हेच खरं...!

(ता. क. सिनेमात काही त्रुटी निश्चित आहेत. काहींना तो प्रचंड अंगावर येणाराही वाटू शकतो. काहींना विस्कळितपणा जाणवेल; पण तरीही त्याकडं थोडं दुर्लक्ष करून एकदा बघावा असा हा सिनेमा नक्कीच आहे.)

दर्जा - चार स्टार
---

16 Apr 2017

पातळ आणि पातळी - मटा लेख

पातळ आणि पातळी... 
----------------------

महाराष्ट्राला विनोदाचे वावडे नाही. या प्रांतात अनेक विनोदी कलाकार, लेखक, नाटककार, दिग्दर्शक होऊन गेले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून ते पु. ल. देशपांड्यांपर्यंत विनोदी लेखनाची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. तीच गोष्ट विनोदी भूमिका करणाऱ्या कलावंतांची. दामुअण्णा मालवणकरांपासून शरद तळवलकरांपर्यंत आणि अशोक सराफपासून ते मकरंद अनासपुरेपर्यंत अनेक कलावंतांनी इथला विनोद समृद्ध केला आहे. आचार्य अत्र्यांपासून ते वसंत सबनिसांपर्यंत अनेक नाटककारांनी प्रेक्षकांना गडाबडा लोळायला लावतील एवढी तुफान विनोदी नाटके लिहिली आहेत. अशा या महाराष्ट्रात सध्या विनोदनिर्मितीचा हिणकस प्रकार रुजू पाहतो आहे. तो म्हणजे पुरुष कलाकारांनी साडी नेसायची आणि स्त्रीरूपात काही तरी विनोद करायचे... विशेषतः 'चला हवा येऊ द्या'सारख्या लोकप्रिय कार्यक्रमात हे वारंवार घडताना दिसतं आहे. याशिवाय पुरस्कार सोहळ्यांचे कार्यक्रम, काही मालिका यातही हेच होताना दिसतं. विनोदनिर्मिती करण्याचे सर्व मार्ग संपल्यासारखे जो उठतो तो साडी नेसतो आणि विनोद करू लागतो, अशी स्थिती झालेली दिसते. हे जे काही चालले आहे, त्यात विनोद तर नाहीच; उलट बीभत्स रस ओतप्रोत वाहताना दिसतो आहे या संबंधित मंडळींच्या लक्षात येत नाही काय? येत असेल, तर ते केवळ नाइलाजाने, पोटासाठी हे प्रकार करीत आहेत काय? आणि लक्षातच येत नसेल, तर मात्र त्यांच्या एकूणच वकुबाविषयी शंका घ्यायला पुष्कळ संधी आहे, हे नक्की. असे प्रकार वारंवार लोकांसमोर येत राहिले, तर विनोदनिर्मिती अशीच असते आणि असं काही तरी केलं तरच तो विनोद, अशी अत्यंत चुकीची समजूत नव्या पिढीसमोर तयार होण्याची शक्यता आहे आणि ते अधिक धोकादायक आहे. त्यामुळंच या सर्व कलाकारांविषयी आदर बाळगूनही असं सांगावंसं वाटतं, की गड्यांनो, आता पातळ सोडा! कारण पातळी तुम्ही खूप आधीच सोडली आहे...
महाराष्ट्रात पुरुषांनी साडी नेसून काम करण्याची परंपरा पुष्कळ जुनी आहे. पूर्वी महिलांना रंगमंचावर काम करायची परवानगी नव्हती, म्हणून नाइलाजानं पुरुषांना हे काम करावं लागायचं. या नाइलाजाच्या संधीचं सोन्यात रूपांतर केलं ते नारायणराव राजहंसांनी, अर्थात बालगंधर्वांनी... बालगंधर्वांच्या स्त्री-रूपाविषयी पुष्कळ वेळा लिहून, बोलून झालं आहे. त्याविषयी पुनःपुन्हा सांगण्यात अर्थ नाही. एक मात्र नक्की. बालगंधर्वांनी साकारलेली स्त्री ही कधीच हिणकस वा उथळ वाटली नाही. स्त्रीच्या सर्व मानमर्यादांचं यथायोग्य पालन करूनच त्यांनी त्या भूमिका साकारल्या होत्या. स्त्रीदेह हा परमेश्वराचा एक चमत्कार आहे. तो आपल्याला लाभला नाही, याची समस्त पुरुषांनी जरूर खंत करायला हवी. मात्र, त्याच वेळी नाटकापुरतं का होईना, त्या रूपात जाण्याची संधी मिळाली तर आधी तो देह समजून घ्यायला हवा. तो देह समजून घ्यायचा तर आधी स्त्रीचं मन समजून घ्यायला हवं. आपल्या भूमिकेचा अभ्यास म्हणून तरी हे करायला हवं. बालगंधर्व असा अभ्यास करीत असत, हे त्यांच्या भूमिकांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून अगदी स्पष्टच दिसतं. जाड्याभरड्या, केसाळ देहाला पाचवार वस्त्र गुंडाळलं म्हणजे पुरुषाची स्त्री होत नाही. असं करणं म्हणजे स्त्रीदेहाला अपमान आहे. असं म्हणतात, की वेडा माणूस हा निर्भय असतो. त्याला कशाचंच भय वाटत नाही, कारण त्याला ते भय जाणवतच नाही. स्त्रीचा वेष धारण करण्यामागचं भय आपल्याकडं लोकांना त्यामुळंच जाणवत नसेल का? 
बरं, साडी गुंडाळली, तर गुंडाळली. पण स्त्रीचा वेष धारण करून करायचं काय? तर अत्यंत पाचकळ, तिसऱ्या दर्जाचे विनोद. ज्या विनोदांना आता इयत्ता दुसरीची मुलंही हसत नाहीत, असे कथित, पांचट विनोद! महाराष्ट्रात चांगला विनोद लिहिणाऱ्यांची वानवा आहे, अशी खंत परवाच द. मा. मिरासदारांनी बोलून दाखविली. ते अगदी खरं आहे. चांगला विनोद लिहिला जात नाही, म्हणून तर हे साडी नेसण्याचे केविलवाणे प्रयोग करावे लागतात. चांगला विनोद लिहायचा तर तो लेखक माणूस म्हणून फार मोकळ्या मनाचा, समृद्ध जीवन जगणारा, सर्व कलांचा आस्वाद घेणारा असा हवा. त्याला आजूबाजूच्या भवतालाचं भान हवं. माणसांच्या जगण्याची ओळख हवी. चांगलं लिहिणं, चांगलं वाचणं, चांगलं बोलणं यातून त्याला आशयसमृद्ध जगण्याची चव कळायला हवी. त्यानंतर तो अशा जगण्याचा अभाव असलेल्या जीवनशैलीतील विसंगती टिपून विनोदनिर्मिती करू शकेल ना! इथं मुळात अशा जगण्याचीच ओळख नसेल, तर त्यातली विसंगती लक्षात येणार तरी कशी? एखाद्याच्या लिंगावरून, वर्णावरून, व्यंगावरून केले जाणारे विनोद हे विनोद नसतातच. तो आपल्या मनातील विकृतीचा हिणकस आविष्कार असतो. हल्ली ही विकृतीच सगळीकडं विनोद म्हणून थोपली जात असल्याचं चित्र दिसतं. यातून पुढच्या पिढीला सकस विनोद म्हणजे काय, हेच कळणार नाही हा यातला सर्वांत मोठा धोका आहे. 
पुरुष कलाकारांनी साडी नेसूच नये असं इथं मुळीच म्हणणं नाही. प्रयोग करायला सर्वांनाच आवडतात. कलाकार स्वतःला आव्हान देत असतो आणि ते योग्यही आहे. विजय चव्हाण यांनी साकारलेली 'मोरूची मावशी' किंवा कमल हसननं साकारलेली 'चाची ४२०' ही चांगल्या भूमिकांची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. दिलीप प्रभावळकर 'हसवाफसवी'त साडी नेसून यायचे तेव्हाही ते कधीच हिणकस वाटले नाहीत. याचं कारण या सर्व कलाकारांनी स्त्री-भूमिका साकारताना कुठलाही अभिविनेश न बाळगता, त्या पात्रातील स्त्रीत्वाला शरण जाण्याचा मार्ग पत्करला होता. त्यातून त्यांनी उभी केलेली स्त्री प्रेक्षकांना स्वीकारार्ह वाटली होती. 'अशी ही बनवाबनवी'मध्ये सचिननं घेतलेलं स्त्री-रूप सर्वांनाच बेहद्द पसंत पडलं होतं. याचं कारण त्या भूमिकेतल्या स्त्रीचं मन अभिनेता सचिननं जाणून घेतलं होतं. स्त्रीच्या देहबोलीचा खूप बारकाईनं अभ्यास केला होता आणि स्त्रीच्या स्त्रीत्वाचा कुठंही अपमान होणार नाही, अशाच पद्धतीनं ती भूमिका पडद्यावर साकारली होती. 
मात्र, अशा गोष्टी अपवाद म्हणूनच ठीक असतात. सचिननंही एकदाच स्त्री-भूमिका केली. आयुष्यभर तो त्या भूमिका करत बसला नाही. अगदी अलीकडं टीव्हीवर वैभव मांगलेची एक मालिका आली होती. वैभव उत्तम कलाकार असला, तरी त्या स्त्री-वेषात तो हिडीसच दिसत होता. अनेक कलाकारांना स्त्री-वेष शोभत नाही. विशेषतः शरीर योग्य नसेल तर अजिबात नाही. त्यातही अॅस्थेस्टिक्सबाबत आपल्याकडं एकूणच आनंदीआनंद आहे. त्यामुळं आपण उभं केलेलं स्त्री-रूप हे हिडीस दिसतं आहे, हेच यांना अनेकदा कळत नाही. कळत असेल आणि तरीही बाष्कळ विनोदनिर्मितीसाठी ते याचा वापर करत असतील तर मात्र ते अधिक गंभीर आहे. 
केदार शिंदेच्या 'अगं बाई अरेच्चा'मधल्या नायकाला - श्रीरंग देशमुखला- अचानक बायकांच्या मनातलं ऐकू येऊ लागतं. हल्ली स्त्री-वेष घेऊन हिडीस विनोद करणाऱ्या कलाकारांना जर बायकांच्या मनातलं ऐकायला आलं, तर मनातल्या मनात त्यांचं जे वस्त्रहरण होईल, त्यापासून सोडवायला कोणताही 'श्रीरंग' येऊ शकणार नाही, एवढं मात्र नक्की.
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे - दि. १६ एप्रिल २०१७)
---

7 Apr 2017

#सम्याआणिगौरीच्यागोष्टी #सीझन 1

सम्या आणि गौरीच्या गोष्टी...
---------------------------------
                                                                                                  (pascal campion)   
                                                            
इंट्रो 
-----

सम्या अन् गौरी...
आंबा अन् कैरी...
-------------------
समीर : तू हिरवी कच्ची, तू पोक्त सच्ची...
गौरी : आणि तू?
समीर : मी 'आम' आदमी...
गौरी : अरे, कोटीबाज माणसा, काय करू तुझं?
समीर : लोणचं घाल...
गौरी : घालतेच... म्हणजे रोज तोंडी लावता येईल...
समीर : वाहव्वा! पण लोणचं कैरीचं घालतात; आंब्याचं नाही...
गौरी : मग तू घालणार लोणचं माझं?
समीर : नाही... तुला असंच खाणार...
गौरी : दात आंबतील सम्या...
समीर : हो, पण नव्या 'दंत'कथाही मिळतील...
गौरी : हो, सांगू या रोज?
समीर : नक्की!

(२२-३-२०१७)
-----


१.
सम्या मरतंय आज...
--------------------------------

गौरी (कृतककोपानं) : काय रे सम्या, नेहमी काय चॅटवर असतोस?
समीर (हसून) : अगं, हाही एक प्रकारचा व्यासंगच आहे...
गौरी (चेष्टेत) : व्यासंग कसला आलाय, असंग आहे... प्राणाशी गाठ पडेल कधी तरी... लक्षात ठेव...
समीर : आपला छंद हाच आपला व्यासंग असणं ही किती महान गोष्ट आहे, तुला कळायचं नाही...
गौरी : तुझा छंदच तुला छंदीफंदी बनवतोय... कधी तरी फटका बसेल...
समीर : संगमनेरचे कवी अनंत फंदी यांचा 'फटका' प्रसिद्ध आहे... आता समीर छंदीचा फटका ऐका...
गौरी : तू कोट्या कर नुसता... आज कोण भेटलंय चॅटवर?
समीर : तुला काय करायचंय? हे माझ्या वैयक्तिक स्पेसवर अतिक्रमण आहे...
गौरी : सांगायचं नाही म्हणून सरळ सांग... वाकड्यात शिरू नको, अन् डोक्यातही जाऊ नकोस...
समीर : हम दिल में आते है... दिमाग में नहीं...
गौरी : आता माझ्या 'दिमाग'चं तू 'दही' करू नकोस हं...
समीर : मस्त लागू दे दही... मी खाईन...
गौरी : काल माझी कैरी केली होतीस, आज दही करतोयस... आंबटशौकीनच आहेस....
समीर : आता कोण करतंय कोट्या?
गौरी : ते मरू दे... तू कोणाशी बोलतोस, काय करतोस मी विचारणार नाही... माझं प्रेम कायमच असेल...
समीर : हाच तो प्रेमाचा सर्वोच्च आविष्कार... आता तू एवढ्या प्रेमात असताना मी कशाला दुसरीकडं जाऊ?
गौरी : तू नुसता बोलबच्चन आहेस. लेखकही होशील.... बरा लिहायचास... तुझ्या पूर्वीच्या मेल पाहा....
समीर : मेल्या मेलची आठवण बरी केलीस... मला कामाच्या मेल पाठवायच्यायत...
गौरी : मग कर ना मेल्या ते काम... इथं काय गप्पा मारीत बसलाहेस...
समीर : जातो, पण गौरी, मला ते तीन शब्द तुझ्याकडून ऐकायचेत...
गौरी (लाजते) : इश्श, कितीदा सांगायचं मेलं...
समीर : ईईई, ते नव्हे गं...
गौरी : मग, कोणते?
समीर (हसत) : Go to hell... किती प्रेमानं म्हणतेस तू हे तीन शब्द...
गौरी (हातातली उशी फेकत) : सम्या, मेलास तू आता...

(२३-३-२०१७)
----

२.

कांदा प्रेमाचा 
-------------------

समीर : आज मैं उपर... आसमाँ नीचे... आज मैं आगे, जमाना है पीछे...
गौरी : एवढी खूश का आहे स्वारी? 
समीर : प्रेमात पडलोय मी परत... 
गौरी : ई... ते होय.. तू सारखाच प्रेमात पडत असतोस... त्यात काय विशेष?
समीर : प्रेमात पडणं ही एक वृत्ती आहे. अशी वृत्ती असलेला माणूस सारखा कुणाच्या ना कुणाच्या प्रेमात पडत असतो.
गौरी : काही गरज नाही. उगाच आपल्या आवरता येत नसलेल्या भावनांना काही तरी तात्त्विक मुलामा द्यायचा झालं...
समीर : यात मुलामा द्यायचा प्रश्नच नाही. मुळात मी काही असं ठरवून प्रेमात पडत नाही. मला ना, ज्या गोष्टी माझ्यात नाहीत त्या ज्यांच्याकडं आहेत अशा लोकांचं आकर्षण वाटतं. मग मी त्यांच्या प्रेमात पडतो.
गौरी : पड ना... पण मग तुझ्या बाबतीत हे सगळे लोक बायका-मुलीच का असतात?
समीर : हा हा... हल्ली मी एका बाईच्या प्रेमात आहे म्हटलं, तर त्याला टीआरपी आहे अजून...
गौरी : हे काही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही.
समीर : गंमत वाटते खरंच. प्रेम असं ठरवून करता येत असतं तर काय पाहिजे होतं? लोकांनी रेसिपी लिहिल्या असत्या प्रेमाच्या...
गौरी : लोकांनी कशाला? तूच लिहिशील. प्रेमात कसे पडावे याचे शंभर प्रकार...
समीर : लोक वेगवेगळ्या कारणांनी प्रेमात पडतात. दर वेळी ते वेगळं असतं. अनेकदा त्यात कसलीही अपेक्षा नसते. उलट काही तरी द्यावं अशी ऊर्मी असते.
गौरी : काही नाही. बायका असे खांदे शोधतच असतात. तुझा खांदा ही काही पब्लिक प्रॉपर्टी नाही हे नीटच लक्षात ठेव.
समीर : अरेरे, काय हा दुस्वास? अशानं माझ्या प्रेमालाच खांदा द्यायची वेळ यायची...
गौरी : बघ. म्हणजे देत होतास ना खांदे? 
समीर : खांद्यावरून आपल्यात वांधे नकोत... नाही तर माझ्या नाकाला कांदे लावायची वेळ यायची...
गौरी (हसत) : अरे, माझ्या अकलेच्या कांद्या, काय करू तुझं?
समीर : पापुद्रे काढायला सुरुवात कर!
(२४-३-२०१७)
-----
३.
सम्या अन् सानेगुरुजी....
-------------------------------------

समीर : चुप चुप बैठी हो, जरूर कोई बात है...
गौरी (वैतागून) : गप रे, कसली घाणेरडी गाणी म्हणतोयस सकाळी सकाळी?
समीर : घाणेरडं? काहीही हं गौरी... किती छान गाणं आहे हे!
गौरी : हो रे... पण मध्यंतरी ते सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिरातीत वापरलं होतं ना, तेव्हापासून डोक्यात गेलंय...
समीर : अगं पण त्यात वाईट काय? जनजागृतीसाठीच वापरलं होतं...
गौरी : सम्या, शटअप! ज्या विषयातलं आपल्याला कळत नाही ना, त्यावर बोलू नये...
समीर : धिस इज नॉट डन... धिस इज इनजस्टिस... तुम्हा बायकांना आम्ही सगळे पुरुष असेच का वाटतो?
गौरी : असेच म्हणजे कसे?
समीर : म्हणजे... म्हणजे.... सदैव तुमची चेष्टा करणारे, खिल्ली उडवणारे...
गौरी : आणि सदैव आपलं पुरुषपण अंगावर मिरवणारे...
समीर : हे तूच बोललीस ते बरं... पण वाईट वाटतं खरंच...
गौरी : सम्या, अनुभव आहे बाबा... उगाच नाही बोलत...
समीर : माझा पण वाईटच अनुभव आहे? मला वाटतं, की कधी तरी तुझ्या जागी जाऊन विचार करावा... आणि मी अनेकदा तो करतोही... मग मला तुझ्या छोट्या छोट्या राग-लोभांची कारणं कळायला लागतात...
गौरी : अगं बाई, हो? हे कधीपासून झालं म्हणे?
समीर : चेष्टा नको करूस गौरी... मला खरंच वाटतं, माझ्यात ना एक स्त्रीचं मन दडलेलं आहे. जगात चार प्रकारचे लोक असतात. पुरुषी मन असलेले पुरुष, स्त्री-मन असलेले पुरुष, स्त्री-मन असलेली स्त्री आणि पुरुष-मन असलेली स्त्री... खरं तर स्त्रीच्या अशा दोन कॅटॅगरी करणं हे त्या जातीवर सर्वस्वी अन्यायकारक आहे, हे मला मान्य आहे. पण मी अगदी ढोबळ सांगतोय... मी स्वतः दुसऱ्या कॅटॅगरीतला आहे. स्त्री-मन असलेला पुरुष... सानेगुरुजी तसे होते बघ...
गौरी (खो खो हसत) : तू आणि सानेगुरुजी? वारले मी हसून... अरे माणसा, जरा काही तरी विचार कर रे नावं घेताना...
समीर : हेच मला तुझं आवडत नाही. काही नीट समजूनच घेत नाहीस...
गौरी : सम्या यार, खरंच आपल्यात तूच बाई आहेस आणि मी कोण आहे कुणास ठाऊक.... बाई असलेली पुरुष की बाई असलेली बाई, की बाई नसलेली नुसतीच बाई...
समीर : गप गं बाई...
गौरी : सम्या, स्त्री-मन आहे तुझं असा दावा करतोस ना, मग सांग बघू आत्ता माझ्या मनात काय चाललंय ते?
समीर : हां, हे सांगायचं राहिलं... एका बाईचं मन दुसऱ्या बाईलाही कळत नाही...
गौरी : उगाच काही तरी... मला माझ्या मैत्रिणींची मनं कळतात बरोबर...
समीर : असं तुला वाटतं... त्यांना वाटतं का विचार... बादवे, मलाही तुझ्या मैत्रिणींची मनं कळतात... पळा...
गौरी (हसत) : सम्या, आज माझ्या हातून तुझा खून लिहिलाय हे नाही का कळलं तुला, गाढवा...
समीर : कसं मारणार? कच्चं खाऊन की भाजून?
गौरी : पेटवून... ही हा हा हा....

(२५-३-२०१७)
----

४.
स्कॉच आणि पंचामृत...
-----------------------------------

गौरी (गुणगुणते) : तुला पाहिले मी नदीच्या किनारी...
समीर : अरे वा... छान गाणं म्हणतीयेस...
गौरी : आज ग्रेस आहेत डोक्यात सकाळपासून.... किती त्यांच्या कविता, त्यांची रूपकं, त्यांची मिथकं, त्यांची शब्दकळा... त्यांचं जगणं...
समीर : गौरी, खरं सांगू का? मला काही ग्रेस झेपत नाहीत. ते काय लिहितात, ते काही कळत नाही.
गौरी : ग्रेसची सवय व्हावी लागते. कुठलीही चांगली गोष्ट सहज मिळत नाही, हे लक्षात ठेव...
समीर : पण एवढं अवघड लिहायचंच का म्हणतो मी? मला पुलं आवडतात. त्यांनी लिहिलेलं सगळं कळतं...
गौरी (हसते) : तू स्कॉच आणि पंचामृताची तुलना करतोयस...
समीर : व्हॉट डू यू मीन? ग्रेस स्कॉच आणि पुलं पंचामृत?
गौरी : म्हणजे सारख्या नसलेल्या दोन गोष्टींची तुलना... स्कॉच आपल्या जागी, पंचामृत आपल्या जागी... दोन्ही आपल्याला आवडतंच ना... पण त्यांचा आस्वाद घेण्याच्या जागा वेगळ्या आहेत. त्यातून आनंद मिळण्याच्या जागाही वेगळ्या...
समीर : पण मग प्या ना तुम्ही स्कॉच... आम्हाला आमचं पंचामृतच बरं... आणि खरं सांगू का, ग्रेस यांचं जे काही लेखन आपल्याला कळतं, ते वाचलं तरी खचायला होतं... आयुष्यात अपरिमित दुःखाखेरीज दुसरं काहीच नाही का, असं वाटतं... माझ्यासारख्या आयुष्य समरसून जगणाऱ्या माणसाला नकोय हे दुःखाचं गाणं....
गौरी : असं बघ सम्या, आयुष्यात प्रत्येक वेळ वेगळी असते. कधी सुख असतं, तर कधी दुःख... आत्ता तुझ्या आयुष्यात दुःख नाहीय आणि टचवूड, ते कधीच नसो... पण ज्यांनी असं कमालीचं दुःख सोसलंय ना, त्यांना जाणवतं ग्रेसना काय म्हणायचंय ते... कातडी सोलवटून ते शब्द आपल्या रंध्रारंध्रात घुसतात...
समीर : ए बाई, तू ग्रेससारखं बोलू नकोस... असेल त्यांचं दुःख मोठं... पण ते दुर्बोध का असावं?
गौरी : अरे, मुद्दाम दुर्बोध लिहायचं म्हणून कुणी लिहितं का रे? आणि ते तुला दुर्बोध वाटतंय हे लक्षात ठेव. तुला जर्मन आणि जपानी भाषा कळत नाही, कारण तुला ती लिपी येत नाही. ग्रेस जाणून घ्यायचा असेल तर वेदनेची लिपी वाचायला शिकावं लागतं.... त्यासाठी स्वतःचं कशाला, दुसऱ्याचं दुःख जाणून घेता यावं लागतं...
समीर : गौरे, कुठून शिकलीस गं हे सगळं? किती छान बोलतीयेस...
गौरी : ग्रेस वाचून... मला सगळा ग्रेस कळतो असं नाही. किंवा त्याच्याएवढं दुःख मी सोसलं आहे, असंही मला वाटत नाही. पण मी त्यांच्या जागी स्वतःला ठेवून बघू शकते. त्यांनी लिहिलेल्या शब्दांच्या पलीकडचे अर्थ शोधते.
समीर : त्यांनी स्वतःला दुःखाचा महाकवी म्हटलंय... मला हे खरोखर झेपत नाही. मला आपले 'पुलं'च आवडतात. पुलंही काही वेगळं सांगत नाहीत. पण किती छान सांगतात!
गौरी : सम्या, मोठा हो रे... पुलंच्या यत्तेतून बाहेर ये... ग्रेस मोठा माणूस आहे हे ज्या दिवशी तुला कळेल त्या दिवशी तू वाचक म्हणून वयात येशील बघ...
समीर : मला 'चंद्रमाधवीच्या प्रदेशात' घेऊन चल, गौरी...
गौरी (गळ्यात हात टाकत, डोळ्यांत पाहत) : अगं बाई, बाळ मोठं झालं की लगेच...
(२६-३-२०१७)
-----

५.

आस्वाद 
------------

समीर : गौरे, चल की पिक्चर टाकू एखादा...
गौरी : वेडाबिडा आहेस काय रे जरा... आज सोमवार आहे. सुट्टी नाहीय. तू जा एकटा... नाही तर तुझ्या खांदेकरी मैत्रिणी असतीलच की मोकळ्या... 
समीर : किती कुचकं बोलशील?  पण खरंच, परवा एक मैत्रीण विचारत होती, की तू एकटा कसा काय बघू शकतोस सिनेमा? गंमतच आहे.
गौरी : त्यात काय! मलाही नाही आवडत एकटीनं बघायला...
समीर : मला आवडतं. तरी थिएटरमधे बरेच लोक असतात. कुणीच नसेल तर जास्त आवडेल खरं तर...
गौरी : अगं बाई... हो का!
समीर : कुठल्याही कलेचा आस्वाद घेण्याची प्रक्रिया ही अखेर वैयक्तिकच असते... 
गौरी : असं काही नाही. पुस्तक वाचणं हे तसं असू शकतं. तिथं आस्वादन वैयक्तिक पातळीवरच असतं. पण सिनेमा, नाटक या सामुदायिक आस्वादनासाठीच जन्माला आलेल्या कला आहेत.
समीर : नुसतं एकत्र बघणं किंवा एकत्र ऐकणं याला सामुदायिक आस्वादन म्हणता येत नाही. तसं तर काही लोक पुस्तकवाचनाचा कार्यक्रमही करतात. त्याला काय म्हणणार मग! शिवाय आकलनाची प्रक्रिया वैयक्तिकच असते.
गौरी : किती कीस पाडतोयस! शिवाय काही गोष्टींची चिकित्सा होत नसते. मला आवडतं तुझ्या हातात हात घालून  सिनेमा पाहायला... बास! 
समीर (हसत) : हे माझ्या आकलनापलीकडचं आहे...
गौरी : तेव्हा मुद्दा असा की, एकटा कुठं उलथू नकोस!
समीर : नक्की! यापुढं कुणी ना कुणी असेल माझ्यासोबत...
गौरी (उशी फेकून मारत) : तू मेलास आज सम्या...
(२७-३-२०१७)
-----
६.

नीट जा, नीट ये... जेवलास का?
------------------------------------------------

समीर (स्टेअरिंगवर हात नाचवत)​ : आज मैं​ उपर, आसमाँ नीचे... आज मैं आगे, जमाना है पीछे...​
गौरी : सम्या, गाडी हळू चालव... काटा बघ... १२०.... कंट्रोल... तू खूप फास्ट चालवतोस गाडी.... नाही तर खरोखर आज मैं उपर और गाडी नीचे अशी अवस्था व्हायची...
समीर : तू शेजारी बसून मला गाडी कशी चालवायची सांगू नकोस हं... मला कळतं...
गौरी : ए शहाण्या, काळजी वाटते आम्हाला म्हणून बोलतेय...
समीर : तुम्हा बायकांचं मला काही कळतच नाही. अगदी शेजारी बसलीयेस, तरी काळजी, शेजारी नसतानाही काळजी...
गौरी : तुला नाही कळायचं ते...
समीर : ऑफिसला निघताना मेसेज करा, पोचलो की मेसेज करा... जेवलो की मेसेज करा... पाणी पिलो की मेसेज करा, ते आपलं हे ते केलं की मेसेज करा... अरे, आम्ही काय लहान बाळ आहोत काय?
गौरी : प्रेम आहे ना म्हणून... तुला काय करायचंय बाकी? सांगितलंय ना मेसेज करायला, तेवढा गुपचूप करायचा...
समीर : सगळ्या बायका सारख्याच कशा याबाबत?
गौरी : तुला काय रे अनुभव बाकीच्या बायकांचा?
समीर (हसत) : म्हणजे, मित्र सांगतात ना... बायको, प्रेयसी, गर्लफ्रेंड, व्हॉट्सअॅप मैत्रीण, फेबु मैत्रीण, भाजीवाली मैत्रीण, जिमवाली मैत्रीण, लायब्ररीवाली मैत्रीण, मॉलवाली मैत्रीण... सगळ्यांचा आपला एकच फंडा... नीट जा... गाडी सावकाश चालव... पोचलास की मेसेज कर... मी म्हणतो, काय गरज? आणि हो, ते J1 झालं का? तो एक महाइरिटेटिंग प्रकार आहे. तो शब्द तर आता ऑक्सफर्ड डिक्शनरीत घालणार आहेत म्हणे.
गौरी : गप्प बस... तुमची काळजी वाटते, गाढवा, म्हणून हे सगळं...
समीर : अगं हो, कळलं की... पण किती ती काळजी...
गौरी : आम्हा बायकांचं असंच असतं... तुला नाहीच कळणार...
समीर : असं काही नाही. आम्हीही तुमची काळजी करतोच की. पण पुरुषांची काळजी करण्याची पद्धत वेगळी असते...
गौरी : उदाहरणार्थ?
समीर (हसत) : आम्ही तुम्हाला शक्यतो कळूच देत नाही तुम्हाला काळजी वाटेल असं काही...
गौरी (डोळे मोठे करत) : अस्सं काय! सम्या, गुढीची काठी मोकळी होणार आहे संध्याकाळी... तू थांबच...

(२८-३-२०१७)
------

७.

आहे हे असं आहे...!
-------------------------------

समीर : ही गौरी म्हणजे कहर आहे, बाई... थोर, थोर...!
गौरी (लाजत) : एवढं काय मेलं ते कौतुक माझं....
समीर : ए, तुझं कोण कौतुक करतंय? (हातातलं पुस्तक दाखवत) मी या गौरीबद्दल बोलतोय...
गौरी : हं... गौरी देशपांडे... गौरी माझी पण आवडती आहे, तुला माहितीय... एवढी एकच आवड जुळते आपली...
समीर : आणि तुझ्यात आणि तिच्यातही नावापुरतंच साम्य आहे. ती कुठं, तू कुठं?
गौरी : एवढे काही टोमणे मारायला नकोयत... गौरीसारखं जगता येणं हे फार भाग्याचं... एवढं भाग्य प्रत्येकीच्या वाट्याला कुठून येणार?
समीर : गौरी वाचताना आपण वेगळ्याच दुनियेत जातो. तिचं जगणं, तिचे विचार, तिची माणसं सगळंच कसं स्वप्नवत...
गौरी : तिचं जगणं होतंच तसं... पण ते वाचकाला तसं भासतं यात तिच्या लेखनाचंही कौशल्य असणार...
समीर : मला हा अनेकदा प्रश्न पडतो. लेखक व्यक्त होतो तो त्याच्या अनुभवाच्या परिघातच ना... तो जे काही जगला, त्यानं जे काही पाहिलं तेच त्याच्या लेखनात येणार...
गौरी : असंच काही नाही. नाही तर फिक्शन लिहिलं नसतं कुणी. मुळात कुठलंही फिक्शन लेखन म्हणजे वास्तव आणि आभासाचा अद्भुत मेळ असतो... त्यात लेखकाचं जगणं किती आणि आभास किती हे शोधायला जाऊ नये.
समीर : असं कसं? हे कुतूहल असणारच. ज्या व्यक्तीनं एवढं ग्रेट लिहिलंय ती व्यक्ती ग्रेटच असणार ना...
गौरी : असं काही नसतं. लेखक स्वतःचे अनुभव आणि इतरांचेही अनुभव एकत्र करून लिहीत असतो. त्याच्यावर ज्यांचा प्रभाव आहे, ज्या गोष्टी त्याला भारावून टाकतात, ज्या गोष्टी त्याला करायला आवडतात, पण कदाचित करता येत नाहीत अशा सगळ्याच गोष्टी त्याच्या लेखनात उतरू शकतात...
समीर : पण तरीही मला वाटतं, लेखकाचं जगणं महत्त्वाचं आहेच. कारण जगणं हे वास्तव आहे. आता गौरी बघ, जग फिरली प्रत्यक्ष... तर तिचं अनुभवविश्व बघ आणि त्याच काळात पुण्यात दहा ते पाच नोकरी करणाऱ्या अन् फुटकळ दिवाळी अंकांत संसार कथा लिहिणाऱ्या एखाद्या बाईचं अनुभवविश्व... यांची तुलना होईल?
गौरी : अशी तुलना करू नये. आणि गौरीसारखे लेखक ना, वाचकांकडूनही एक किमान प्रगल्भतेची अपेक्षा ठेवून असतात. वाचकाला असं मोठं करणारे लेखक पण आपोआप ग्रेट ठरतात...
​समीर : पण निखळ आनंद देणारे लेखक मोठे नाहीत का?
गौरी : परत तू चुकीची तुलना करतोयस... प्रत्येक वेळेची गरज असते. आपण कायम गोडच खात नाही किंवा सदैव तिखटच खात नाही ना...
समीर : हं, पटतंय. गौरी, त्या गौरीसारखाच मी तुझ्याही प्रेमात आहे...
गौरी : बघ हं... विचार कर.... हा घाट दुस्तर आहे... एकेक पान गळावया लागले, तरी थांग लागणार नाही...
समीर : हा... हा... हा... तरीही तू आवडशीलच.... आहे हे असं आहे!

(२९-३-२०१७)
---

८.

आय अॅम द हॅपीनेस...!
------------------------------------

समीर : गौरी, तुला प्रिया आठवते? आज भेटली होती...
गौरी : कोण प्रिया? तुला छप्पन मैत्रिणी... ही कुठली?
समीर : अगं, ती आमच्या आधीच्या ऑफिसमध्ये होती बघ...
गौरी : हां, तिच्या बॉसबरोबर काही तरी पंगा घेऊन तिनं ऑफिस सोडलं होतं, ती?
समीर : हो. तीच... आज भेटली होती... आम्ही सीसीडीत गेलो मग...
गौरी (संशयानं) : तिचं काय? तुलाच कशी काय भेटली?
समीर : संशयात्म्या, ऐकू घे जरा... ती बोलताना एक वाक्य फार छान म्हणाली...
गौरी : काय?
समीर : ती म्हणाली - आय अॅम द हॅपीनेस...! मला फार आवडलं हे.... किती छान वाक्य आहे ना... आय अॅम द हॅपीनेस!
गौरी : हं.. ठीक आहे. बरं आहे...
समीर : मला याचं महत्त्व फार वाटतं. याचं कारण गेल्या काही वर्षांत ती ज्या प्रकारचं आयुष्य जगली ना, ते मला बऱ्यापैकी माहिती आहे. त्यामुळं त्यातून बाहेर पडून ती आज एवढी फ्रेश दिसत होती, की मलाच खूप छान वाटलं...
गौरी : तुला माहितीय का समीर, हा स्त्रीचा स्वभावधर्म आहे. सगळ्या बायका अशाच असतात. आम्ही आमच्या आयुष्याचं ओझं वाहणं आता बंद केलंय. आम्हाला आता आनंद लुटायचा आहे...
समीर : मला तिचा अॅट्यिट्यूड आवडला. दोन-तीन वर्षांपूर्वी हीच प्रिया काय घायकुतीला आली होती, ते मी पाहिलंय...
गौरी : बायका बदलतात. काळानुसार स्वतःला अॅडजस्ट करतात. तुम्हा पुरुषांनाच नाही जमत हे...
समीर : ती आणखी काय म्हणाली माहितीय का, जोडीदाराला संपूर्ण स्वातंत्र्य देणं हेच प्रेम!
गौरी : कुठली तरी इंग्लिश कादंबरी वाचून आली असेल. त्यातली वाक्यं फेकली तुझ्या तोंडावर... काय रे, तिच्या वाक्यांचं एवढं कौतुक करतोयस... तू स्वतः काय करतोस?
समीर : प्रत्येक गोष्ट स्वतःवर ओढवून घ्यायला नकोय काही अगदी...
गौरी : कळलं ना सम्या, चमकदार वाक्यं टाकणं आणि तसं आयुष्य जगता येणं यात फार फरक असतो ते...
समीर : मला एवढंच कळतं, समोरच्याचं जे चांगलं असेल, ते घ्यावं... मला प्रियाचा अॅट्यिट्यूड आवडला... आता मीही म्हणणार - आय अॅम द हॅपीनेस...
गौरी (गळ्यात पडत) : नो बेबी, आय अॅम युअर हॅपीनेस.....


(३०-३-२०१७)
-----

९.

जेथे 'लाघव' तेथे सीता...
---------------------------------

गौरी : सम्या, चल, मस्त गझलचा कार्यक्रम आहे. जाऊ या...
समीर : मला नाही कळत ते... तू जा...
गौरी : आपली एकही आवड जुळत नसताना आपण का प्रेमात आहोत रे?  
समीर : म्हणूनच आहोत कदाचित... बरं असतं ते! 
गौरी : याला काय अर्थ आहे? एकमेकांच्या साथीनं आपण वाढलं पाहिजे ना! 
समीर : काय गरज? तुझी आवड तुझी... माझी आवड माझी... एकमेकांच्या स्पेसवर अतिक्रमण कशाला? 
गौरी : ही काही सक्ती नाहीय. आणि तू नाही आलास तर माझा काहीच तोटा नाहीय. पण काही गोष्टींचा आनंद एकत्रित लुटण्यात गंमत असते. तुला कधी कळणार?
समीर : ही गंमत दोघांना पण आली पाहिजे ना! 
गौरी : अरे येडू, दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होण्यातली गंमत! मला गझल आवडते तर आपण ती जाणून तरी घ्यावी असं का नाही वाटत तुला?
समीर : खरंय. आम्हा पुरुषांना हे जरा कमी असतं नाही! 
गौरी : जरा? अरे, तुम्हाला काहीच कळत नाही. आम्ही बायका वेड्या... आम्हाला भलत्या अपेक्षा असतात. आम्ही न सांगता तुम्हाला सगळं कळावं अशी आमची अपेक्षा असते. वेडेपणाच की!
समीर : नाही कळत आम्हाला... सरळ सांगितलेलं कळतं. उगाच भलत्या अपेक्षा कशाला? खरंच वेडेपणा!
गौरी : पण कधी तरी करून बघ सख्या हा वेडेपणा! कर के देखो! अच्छा लगता है...
समीर : तुझ्यासाठी येईन गं... गझलच काय, रामाच्या देवळात कीर्तनालाही येईन...
गौरी : हा हा हा... मी जायला हवं ना तिथं... 
समीर : खरंय. 'जेथे राघव तेथे सीता' हे आता शक्यच नाही, नाही का! उलट हल्ली 'जेथे लाघव तेथे सीता' असं असतं. मग हे लाघव दाखवणारा कुणी का असेना! 
गौरी : खरंय... पण मग आम्हाला हे लाघव हवं असतं हे तुम्हाला कधी कळणार? मग कशाला बोलतोस?
समीर : आम्ही नाहीच बोलत. जा... जा...
गौरी (हसत) : चिडतोयस काय वेडू! चल, मी तुला नेतेच गझल ऐकायला! च... ल... 
समीर : आपल्या वादांची गझलच किती गोड आहे!
(१-४-२१७)
----

१०.

सहेला रे...
---------------

गौरी : सम्या, कुठं गायब होतास रे एवढे दिवस?
समीर : बरं असतं असं गायब झालेलं... नाही तर अतिपरिचयात अवज्ञा होते...
गौरी : तुझा काय परिचय व्हायचा राहिलाय आता मला? आणि अवज्ञा तर तू करतोसच... त्यातही काय विशेष नाही...
समीर : तिरकस बोलणं सोडू नकोस हं अगदी...
गौरी : बरं, ते राहू दे... कुठं गेला होतास? काय करत होतास? गझलेच्या कार्यक्रमाविषयी काही बोलला नाहीस...
समीर : कधी कधी ना असं वाटतं, काही बोलूच नये. प्रत्येक वेळी आपली प्रतिक्रिया शब्दांत मांडता येतेच असं नाही. मग शांत बसावं असं वाटतं...
गौरी : हे अगदीच खरंय. मला काही काही सिनेमे पाहताना असं होतं. एकदा असं वाटतं, की तुला सांगावं, यावर काही तरी लिही... पण नंतर वाटतं नकोच. आपल्या मनात त्या कलाकृतीविषयी जे काही आतून वाटतं ना, ते तसंच राहावं असं वाटतं. कितीदा असं होतं ना...
समीर : हो, एखादं सुंदर गाणं ऐकलं, सुंदर चित्र पाहिलं, किंवा अगदी छान रंगलेली मॅच पाहिली तरी मला असं होतं...
गौरी : परवा किशोरीताई गेल्या, तेव्हा नाही का... आपण फक्त शांत बसलो आणि 'सहेला रे' ऐकलं.... मग ऐकतच राहिलो... लूपमध्ये... झोप लागलीच नाही...
समीर : कशी लागणार? कलाकार हादेखील मर्त्य माणूसच. पण त्याची कला त्याला कशी अजरामर करून ठेवते बघ! आता किशोरीताई केवळ ऐहिक अस्तित्वानं आपल्यात नसतील. त्यांच्या मैफली, त्यांचा आवाज असेलच आपल्यासोबत....
गौरी : म्हणून काही तरी असं अविस्मरणीय करून जायला हवं बघं सम्या...
समीर : आपली कुठली आली आहे एवढी कुवत?
गौरी : अरे, कुवतीचा मुद्दाच कुठं येतोय यात... तुझ्या परीनं तू जे आयुष्य जगतोयस ना, ते चांगलं जगायचा प्रयत्न कर. चांगलं बघ, चांगलं वाच, चांगलं लिही... आता तुला चांगलं लिहिता येतं ना, मग तू तेच काम कर आणि जे करशील ते सर्वोत्कृष्टच असेल याचा ध्यास घे....
समीर : पण हे 'चांगलं' ठरवणार कोण?
गौरी : तू आतून, मनापासून लिहिलंस ना की ते चांगलंच असतं बघ. मला माहितीय. मी एवढी वर्षं पाहतेय तुला लिहिताना... तू तसं लिहिलेलं मला लगेच कळतं आणि तेच आवडतं...
समीर (हसून) : आणि प्रेम करतेस म्हणूनही आवडत असेल...
​गौरी (गळ्यात हात टाकत) : प्रेमात अवघा रंग एक झाला, की असंच होत असतं....

(७-४-२०१७)

 ----

सीझन २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा...