16 May 2013

डावे राहिले पाहिजेत...

डावे राहिले पाहिजेत...
---------------------------------------------

बंगालच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत डावे हरणार, असं भाकीत वर्तवलं जात आहे. खरं तर जेवणाच्या पानात डाव्या बाजूला असलेल्या गोष्टींचं जे महत्त्व आहे, तेच आपल्या राजकीय व्यवस्थेत डाव्यांचं आहे, असं म्हटल्यास कदाचित डाव्यांना आवडणार नाही, पण बाकी सगळ्यांना बहुतेक पटेल. थोडक्यात, आपली राजकीय व्यवस्था बेचव, मूल्यहीन व्हायची नसेल, तर डावे राहिले पाहिजेत...






देशभर सध्या वर्ल्ड कपची धूम असली, तरी नंतर पाच राज्यांच्या महत्त्वपूर्ण निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकांत सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते पश्चिम बंगालकडं. या वेळी १३ मे रोजी निकाल जाहीर होतील, तेव्हा बंगालमधून डाव्यांची हकालपट्टी होऊन ममता बॅनर्जी यांचं सरकार सत्तेवर येईल, असाच बहुतेक राजकीय पंडितांचा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांतलं डाव्यांचं कर्तृत्व तसंच सांगतं आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत झालेल्या बहुतेक स्थानिक निवडणुकांत डाव्यांना मार खावा लागला आहे. लोकभावनांचा अंदाज अशा निवडणुकांतून येत असतो. तो पाहता या वेळी ममतादीदी विळा-कोयता कायमचा मोडून फेकून देणार, अशी शक्यता वर्तविली जात असेल, तर ती चुकीची म्हणता येत नाही. तसे निकाल लागले, तर डाव्या पक्षांच्या हातून या देशातलं एक महत्त्वाचं राज्य जाईल. गेली ३४ वर्षे सलग सत्ता गाजविल्यानंतर डाव्यांची सत्ता गेली, तर या घटनेकडं सगळा देश कसा पाहील, हे बघणं औत्सुक्याचं ठरेल.
बंगालमधील सत्ता जाणं याचा अर्थ या देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या रिंगणातून डाव्यांचं बाहेर पडणं असाच लावला जाईल. देशात एकीकडं काँग्रेस आणि दुसरीकडं भाजप असे दोनच प्रमुख पक्ष असावेत, अमेरिकेसारखी द्विपक्षीय पद्धत असावी, अशी मागणी अनेकदा होत असते. किंबहुना अमेरिकेसारखी अध्यक्षीय पद्धत आपण अंगीकारावी, असंच बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. या सगळ्यांचा आवाज डाव्यांच्या पराभवामुळं मोठा होईल. मात्र, असं व्हायला नको. डावे पक्ष म्हणजे आपल्या देशातल्या राजकीय व्यवस्थेमधला एक महत्त्वाचा भाग आहे. किंबहुना डावे म्हणजे देशाची उरलीसुरली विवेकबुद्धी आहे. ती शाबूत राहणं गरजेचं आहे.
डाव्यांचं भारताच्या राजकीय प्रवासातलं महत्त्व नव्यानं सांगायला नको. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश साम्राज्य लयाला गेलं. दोस्त राष्ट्रांचा विजय झाला असला, तरी एकूणच जागतिक व्यवस्थेमधलं त्यांचं स्थान डळमळीत झालं होतं. त्यातूनच भारतासारखे अनेक देश स्वतंत्र करणं ब्रिटनला भाग पडलं. याच काळात सोव्हिएत युनियन आणि अमेरिका यांच्यातलं शीतयुद्ध सुरू झालं. देशाची सूत्रं नेहरूंकडं गेल्यावर भारताचा ओढा सोव्हिएत युनियनकडं गेला. नेहरूंनी मिश्र समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारली. नेहरू कडवे डावे नसले, तरी उजवेही नव्हते. किंबहुना उजवे त्यांना डावेच मानत. (नेहरूंचा आदर्श घेऊन अगदी हिंदी चित्रपटसृष्टीही समाजवादी व्यवस्थेचा पुरस्कार करण्यात हिरिरीने पुढं होती. १९५८ ते १९६० या काळात आलेले बी. आर. चोप्रांचा नया दौर, मेहबूब खानचा मदर इंडिया आणि राज कपूरचे आवारा, श्री ४२० हे चित्रपट पाहा. राज कपूरला सोव्हिएत रशियात एवढी लोकप्रियता मिळण्याचं हेही एक कारण आहेच.) तरीही तेव्हाच्या एकत्रित कम्युनिस्ट पक्षानं त्यांना विरोध सुरूच ठेवला होता. सोविएत युनियनच्या हस्तक्षेपानंतरच डाव्यांनी लोकशाही चौकटीत राहून काम करायचं ठरवलं आणि काँग्रेसला टोकाचा विरोध करणं सोडून दिलं. मात्र, केरळमधलं (तेव्हाचं डाव्यांचं एकमेव) नंबुद्रिपाद सरकार १९५९ मध्ये बरखास्त करून नेहरूंनी पुन्हा डाव्यांची नाराजी ओढवून घेतली. नंतर १९६२ च्या चीन युद्धाचा आणि तत्कालीन जनरल सेक्रेटरी ए. के. घोष यांच्या निधनाचा फटका कम्युनिस्ट पक्षाला बसला. श्रीपाद अमृत डांगे अध्यक्ष आणि नंबुद्रिपाद जनरल सेक्रेटरी असा प्रवास सुरू झाला. मात्र, वाढत्या वादाची परिणती पक्ष फुटण्यात झाली आणि १९६४ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जन्म झाला. कलकत्त्यात झालेल्या अधिवेशनात सुंदरय्यांकडं जनरल सेक्रेटरीपदाची सूत्रं गेली.
सत्तरचं हे दशक एकूणच भारताच्या इतिहासातलं एक आगळं पर्व आहे. याच दशकात जगभरही काय काय घडत होतं. हा काळ चळवळींचा होता, नवनिर्माणाचा होता. एका परीनं तरुणांच्या नव्या जाणिवांचा होता. पाश्चात्त्य जगात झंकारणाऱ्या 'बीटल्स'चे झंकार थेट कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजात आणि दिल्लीच्या जेएनयूत ऐकू येत होते. 'कॉफीशॉप'मध्ये जग उलथून टाकण्याच्या, क्रांतीच्या गप्पा रंगत होत्या. मार्क्सवाद, समाजवाद, भांडवलशाहीवर हिरिरीनं चर्चा झडत होत्या. दिल्लीत नवी राजकीय समीकरणं जुळत होती. नेहरूंच्या निधनानंतर पाचच वर्षांत काँग्रेस फुटली होती. एकीकडे संस्थानिकांचे तनखे बंद होत होते आणि दुसरीकडं 'सरकारी बाबू' नावाचा नवा संस्थानिक उदयास येत होता. महात्माजींचा आदर्श डोळ्यांपुढं ठेवून जगणारी, रोज सूतकताई करणारी पिढी लयाला चालली होती आणि दुसरीकडं 'परमिट राज'च्या माध्यमातून भ्रष्टाचार हा नवा शिष्टाचार होऊ घातला होता. हिंदी सिनेमा रंगीत होऊ लागला होता. 'मेरे सपनों की रानी कब आयेगी तू...' म्हणत किशोर थैमान घालू लागला होता. रेडिओ खेड्यापाड्यांत पोचला होताच, पण अमेरिकेतील 'हिप्पी संस्कृती'ही महानगरांतून रात्री उशिरापर्यंत तरुणाईला झिंग आणत होती. नाट्यकलेत नवे प्रयोग होत होते. तेंडुलकर, मोहन राकेश, बादल सरकारांची नाटकं गुळमट मध्यमवर्गीय जगण्याला कडकडून दंश करीत होती. विद्यापीठं चळवळींची हृदयस्थान झाली होती.
त्याच वेळी चारू मजूमदार व कनू सन्याल यांची नक्षलबाडी नव्या क्रांतीचं केंद्र बनू पाहत होती. इंदिरा गांधींनी १९६७ मध्ये नऊ राज्यांतील विरोधी पक्षांची सरकारं बरखास्त केली. त्यात बंगालचं सरकारही होतं. मजूमदारांची नक्षल क्रांती बंगाल सरकारनं दडपून टाकली. सरकारमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षही प्रमुख भागीदार होता. पुढच्या दहा वर्षांतच बंगालमध्ये डाव्या पक्षांची सत्ता आली आणि ज्योती बसू मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून आजपर्यंत सलग ३४ वर्षं बंगाल हा डाव्यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या ३४ वर्षांत बंगालची किती प्रगती झाली, कोलकत्याचं देशाच्या राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक-औद्योगिक नकाशावर असलेलं महत्त्व किती उरलं हे सगळे कळीचे मुद्दे आहेत. डाव्यांची बंगालमध्ये ताकद होती ती केडरबेस्ड पद्धतीत. निवडणुका जिंकण्याचं एक तंत्र असतं. तेही डाव्यांनी या सगळ्या काळात चांगलंच अवगत केलं होतं. त्यामुळं डाव्यांचा पराभव डावेच करू शकतील, असं म्हटलं जातं. खरोखर, आज डाव्यांमुळंच त्यांच्यावर पराभवाची वेळ आली आहे.
तरीही डावे राहिले पाहिजेत. याचं कारण १९९१ नंतर भारतानं स्वीकारलेल्या आर्थिक उदारीकरणानंतर आपण भांडवलशाहीच्या वारूवर स्वार होऊन सुसाट वेगानं धावतो आहोत. अशा वेळी आर्थिक प्रगतीच्या नादात नीती-अनीतीचं भान कसं सुटतं, याचं दर्शन गेल्या एक-दोन वर्षांत सरकारनं दाखवलंच आहे. या वीस वर्षांत बारा वर्षे काँग्रेसचं किंवा त्यांच्या आघाडीचं सरकार होतं. मात्र, २००४ ते २००९ या काळात या सरकारवर डाव्यांचा अंकुश होता. तेव्हा अणुकरारासारखा सामान्य जनतेला क्लिष्ट असलेला विषय डाव्यांमुळंच रस्त्यावरच्या चर्चेचा विषय बनला. खरं तर काँग्रेसचं मध्यममार्गी सरकार, डॉ. मनमोहनसिंग यांच्यासारखा सभ्य-सुसंस्कृत चेहरा आणि त्यावर डाव्यांचा अंकुश ही कदाचित भारतीय मतदारांना आदर्श व्यवस्था वाटली असावी. म्हणूनच २००९ मध्ये या सरकारला लोकांनी पुन्हा निवडून दिलं. मात्र, डाव्यांच्या नतद्रष्टपणामुळं त्यांच्या जागा कमी झाल्या आणि हे सरकार त्यांच्या पाठिंब्याविना सत्तेत येऊ शकलं. त्यानंतर ते कसं मोकाट सुटलं आहे, हे आपण पाहतो आहोतच.




डाव्यांच्या काही चांगल्या गोष्टी त्यांचे शत्रूही मान्य करतील. एक तर त्यांच्या वैयक्तिक चारित्र्याविषयी कुणी शंका घेऊ शकत नाही. दुसरं म्हणजे मुद्द्यांवर लढे देण्याची त्यांची क्षमता व चिकाटी दुसऱया कुठल्याच पक्षात नाही. तिसरं म्हणजे पक्षांतर्गत वादांवरही ते लोकशाही मार्गांचा वापर करतात. यामुळंच डावे पक्ष म्हणजे देशातली उरलीसुरली राजकीय विवेकबुद्धी आहे, असं वाटतं. अर्थात काही काही बाबतींत डावे वात आणतात. एक म्हणजे त्यांची पोथिनिष्ठता. दुसरं म्हणजे त्यांची तर्कदुष्टता आणि तिसरं म्हणजे त्यांच्यात अजिबात नसलेली लवचिकता. या काही गोष्टी त्यांनी दुरुस्त केल्या, तर डावे पक्ष आपल्या देशात आदर्श राजकीय पक्ष म्हणून दीर्घकाळ काम करू शकतील. घरातल्या एखाद्या वडीलधाऱ्या माणसाचं काम या पक्षाला संसदेत बजावता येईल. भारतात ऐहिक प्रगती आणि मूल्यसंस्कार यांच्यात कायमच मूल्यसंस्कारांना झुकतं माप दिलं जातं. भविष्यातही हे चित्र कायम राहावंसं वाटत असेल, तर डावे राहिले पाहिजेत.

(पूर्वप्रसिद्धी - मे २०११, महाराष्ट्र टाइम्स, पुणे)
--- 

12 May 2013

माधुरी, स्वागत आहे!





'प्रिय माधुरी, तुझं स्वागत आहे,' असं म्हणतानाही जीभ अडखळतेय... कारण स्वागत हे दुसरीकडून कुठून तरी आलेल्याचं करतात. मुळात तू कुठं गेली नव्हतीसच... तू इथंच होतीस - आमच्या हृदयात! कारण एकोणीस वर्षांपूर्वी तेजाबमध्ये एक दो तीन... करीत तू आमच्यावर जी मोहिनी घातलीयस, ती अद्याप उतरायला तयार नाही.
तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत श्रीदेवीचं राज्य होतं. नव्हे; ती अनभिषिक्त सम्राज्ञीच होती! दाक्षिणात्य नायिका आणि उत्तरेतले पंजाबी नायक यांचंच हिंदी चित्रपटसृष्टीवर कायम वर्चस्व राहिलेलं आहे. तुझ्यापूर्वी दुर्गा खोटेंपासून स्मिता पाटीलपर्यंत अनेक मराठी अभिनेत्रींनी हिंदीत ठसा उमटवला होता, नाही असं नाही. पण एकछत्री अंमल कुणी गाजवला नव्हता. राजश्री प्रॉडक्शन्सच्या 'अबोध'मधून तू १९८४ मध्ये प्रथम रूपेरी पडद्यावर पदार्पण केलंस, तेव्हा तुझ्याबाबतही असा विचार कुणी केला नव्हता. पुढं 'आवारा बाप', 'हिफाजत', 'स्वाती', 'उत्तर दक्षिण' वगैरे चित्रपटांतून तू फुटकळ भूमिका केल्यास, पण तेव्हाही तुझं अस्तित्व दखल घेण्याजोगं नव्हतंच. पण एन. चंद्रांच्या तेजाबनं जादू केली आणि पुढचा सगळा इतिहास आहे.
माधुरी, तुझं खळाळतं हास्य, अप्रतिम नृत्यनिपुणता, तुझं अभिनयकौशल्य सगळं सगळंच मोहवणारं होतं. पुढं आमीरबरोबर तू 'दिल' शेअर केलंस आणि आम्ही मनोमन आमचं 'दिल' तुला देऊन बसलो. (त्यामुळंच त्या काळात एक्स्ट्रीम क्लोजअपमध्ये दिसणाऱ्या तुझ्या चेहऱ्यावरच्या मुरुमांच्या पुटकुळ्या आम्हाला दिसल्या नाहीत!) मधल्या काळात तू 'प्रेमप्रतिज्ञा', 'राम-लखन', 'परिंदा', 'त्रिदेव', 'वर्दी', 'इलाका', 'मुजरीम' अशा चित्रपटांतून दिसत राहिलीस. पण 'प्रेमप्रतिज्ञा' किंवा 'परिंदा'चा अपवाद वगळता अन्य चित्रपटांतून तू तशी शोभेची बाहुलीच होतीस. नंतर १९९२ मध्ये तू 'बेटा' अनिल कपूरबरोबर 'धक धक करने लगा' करीत पुन्हा पडदा गाजवलास. तुझ्या त्या अदेनं घायाळ झाला नाही, असा तुझा एकही चाहता नसेल. त्यापूर्वीच १९९१ मध्ये आलेल्या नानाच्या 'प्रहार'मध्ये तू विनामेकअप काम करून रसिकांची दाद मिळवली होतीस. त्याच वर्षी आलेल्या सुपरहिट 'साजन'नं तुझी सम्राज्ञीपदाकडं वाटचाल सुरू झाली होतीच. 'धक धक'नं त्यावर शिक्कामोर्तब झालं. पुढं 'संगीत', 'प्रेमदिवाने', 'खेल', 'खलनायक', 'जिंदगी एक जुआ' वगैरे चित्रपटांतून तुझा निर्वेध प्रवास सुरू झाला.


मग आला १९९४ चा 'हम आप के है कौन!' या चित्रपटातील निशानं तुला भारतातल्या घराघरांत स्थान मिळवून दिलं. तुझी चुलबुली, खोडकर, हसरी आणि (तरीही) मादक निशा सर्वांनाच आवडून गेली. अर्थात तुझ्या अभिनयक्षमतेचा खरा कस लागेल, अशा फारशा भूमिका तुला मिळत नव्हत्या, हेही खरंच. पण १९९७ मध्ये आलेल्या प्रकाश झा यांच्या 'मृत्युदंड'नं तीही उणीव भरून काढली. त्याच वर्षी आलेल्या 'दिल तो पागल है'नं तुला करिअरच्या सर्वोच्च शिखरावर नेलं.
आता तुझ्या सम्राज्ञीपदाला जवळपास एक दशक होत आलं होतं. मकबूल फिदा हुसेन यांनी तुझ्यावर 'फिदा' होऊन 'गजगामिनी'ची निर्मिती केली होती. अर्थात त्यापूर्वीच १७ ऑक्टोबर १९९९ ला तू हळूच अमेरिकेतल्या डॉ. श्रीराम नेनेंशी विवाह करून तुझ्या तमाम रसिकांकडं 'पाठ' फिरविली होतीस...
...मग तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर 'देवदास'मधून तुझी 'चंद्रमुखी' आली आणि आम्ही पुन्हा सुखावलो. पण नंतर पाच वर्षं गेली आणि सर्व नायिकांचं करिअर विशिष्ट वयानंतर आणि लग्नानंतर संपुष्टात येतं, तसंच तुझ्याबाबत झालं, असं समजून आम्ही तुझ्या जुन्या आठवणींत रमलो.



आणि आता अचानक पाच वर्षांनी तू परत येतेयस... 'आजा नच ले' म्हणत आम्हाला बोलावतेयस... ग्रेट! माधुरी, तू खरंच थोर आहेस. आज वयाच्या एक्केचाळिसाव्या वर्षी 'नच ले'च्या 'प्रोमो'मध्ये तू काय दिसलीयस! विशेषतः जीन्स आणि टॉपमध्ये... टॉपच! स्वागत आहे... ये, माधुरी! आम्हीही तुझ्याबरोबर आणि तुझ्यासाठी नाचण्यास आतुर आहोत...

(पूर्वप्रसिद्धी - ३० नोव्हेंबर २००७, सकाळ)
---

वेलकम सेनोरिटा...




काजोल म्हणजे उत्साहाचा अखंड कोसळणारा धबधबाच. तिचा लडिवाळपणा, अवखळपणा... कधीच न आटणारा हास्याचा झरा... हळूच दाताखाली ओठ दाबून स्माइल टाकण्याची तिची अदा... सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तिचं सावळं सुंदर रूप. सौंदर्य म्हणजे पांढरापिट्ट गोरेपणा हे समीकरण नामंजूर करणाऱ्या वहिदाची परंपरा पुढं चालविणारी ही काजोल. ती परीराज्यातली राणी कधीच वाटली नाही. 'गर्ल नेक्स्ट डोअर' असणं हे तिचं शक्तिस्थान होतं. आपली जिवाभावाची मैत्रीण असावी, तर अशी... हे तिच्याबद्दल जसं वाटलं, तसं इतर नायिकांबद्दल क्वचितच वाटलं. (त्यांच्याबद्दल काय वाटलं तो वेगळा भाग!) पण काजोलचं हे असं आपल्याआपल्यात असणं इतकं नैसर्गिक होतं, की पाहता पाहता 'कार्टी काळजात घुसली'! 
काजोलची कारकीर्द अकरा वर्षांची. हिंदी नायिकांच्या मानानं पुष्कळच मोठी. या काळात तिनं केलेले एकूण चित्रपट (गेस्ट अपिअरन्ससह) केवळ २५. मात्र, तरीही ती लक्षात राहिली, ठसा उमटवत राहिली ते तिच्या उत्स्फूर्त, नैसर्गिक अभिनयाच्या जोरावर. 
राहुल रवैलच्या 'बेखुदी'तून (१९९२) तिनं चाचपडतच पदार्पण केलं. पुढच्याच वर्षी आलेल्या 'बाजीगर'नं खऱ्या अर्थानं तिच्यासाठी यशाची कवाडं खुली केली. 'उधार की जिंदगी'तल्या जितेंद्रच्या नातीची तिनं साकारलेली भूमिका समीक्षकांचीही वाहवा मिळवून गेली. त्यानंतर काजोलचा प्रवास निर्वेधपणे सुरू झाला. १९९४-९५ मध्ये तिला धडाधड सिनेमे मिळत गेले. 'ये दिल्लगी', 'करन-अर्जुन', 'ताकत', 'हलचल', 'गुंडाराज' हे तिनं या काळात केलेले चित्रपट. त्यात तिला अभिनेत्री म्हणून करण्यासारखं काहीच नव्हतं. पण प्रेक्षकांच्या नजरेसमोर सातत्यानं येत गेल्यानं आघाडीच्या नायिकांमध्ये तिचं नाव चमकू लागलं.



'डीडीएलजे'ची क्रांती 

याचाच फायदा मिळून तिला मिळाला यशराज बॅनरचा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'. यश चोप्रांनी प्रथमच दिग्दर्शनाची धुरा आपल्या मुलाकडं - आदित्य चोप्राकडं - सोपविली होती. त्यानं या चित्रपटाचा फॉर्म्युलाही टिपिकल निवडला. मूळ पंजाबी, पण लंडनमध्ये स्थायिक झालेलं कुटुंब, भारतीय संस्कारांना जपणारं... नायिकेला प्रवासात भेटणारा 'जिप्सी' नायक, त्यांचं एकमेकांच्या प्रेमात पडणं, तिथून भारतात... मग लग्न समारंभ... मुलीच्या घरच्यांना नाराज न करता त्यांचं प्रेम मिळवूनच मुलीचा हात मिळविण्याची नायकाची 'घरंदाज' प्रवृत्ती! सगळा कसा 'हिट'चा फॉर्म्युला! 'यशराज'चा फॉर्म्युला तोच असला, तरी 'आदी'ची दृष्टी नवी होती. त्यांच्या नायिकेच्या 'रोल'मध्ये अवखळ, 'चुलबुली' काजोल 'सिमरन'च्या रूपात फिट्ट बसली. शाहरुखनं तिला मारलेली 'सेन्योरिटा' ही लाडिक हाक आणि काजोलनं 'मैं चली बन के हवा...' म्हणत दिलेला तितकाच खणखणीत प्रतिसाद हे 'कॉम्बी' एवढं तुफान यशस्वी झालं, की 'डीडीएलजे'चं यश ही 'बॉलिवूड'ची दंतकथा बनली. काजोलशिवाय 'डीडीएलजे' ही कल्पनाच आपण करू शकत नाही, एवढी तिची 'सिमरन' हिट झाली!
अर्थात काजोलनं एवढ्यावरच समाधान मानलं नाही. पुढे आलेल्या राजीव रायच्या 'गुप्त'मध्ये (१९९७) तिनं नकारात्मक भूमिका वठविली. या चित्रपटाबद्दल तिला सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेबद्दलचं 'फिल्मफेअर' मिळालं. हे पारितोषिक मिळविणारी ती पहिलीच अभिनेत्री. यानंतर तनुजा चंद्रानं 'दुश्मन'मध्ये (१९९८) काजोलला डबल रोल दिला. सोनिया आणि नयना सहगल या दोन्ही भूमिकांत काजोलनं जबरदस्त छाप पाडली. आशुतोष राणाच्या तगड्या व्हिलनसमोर उभी राहिलेली काजोल एक 'समर्थ' अभिनेत्री आहे, यावर शिक्कामोर्तबच केलं 'दुश्मन'नं. याशिवाय 'प्यार तो होना ही था'मधली तिची 'संजना' कोण विसरेल? यातील तिचा नायक अजय देवगण हाच तिच्या खऱ्या आयुष्यातलाही नायक आहे, हे हळूहळू सर्वांनाच ठाऊक झालं होतं. इतर नायक-नायिकांप्रमाणे केवळ 'अफेअर' न करता, अजय व काजोलनं १९९९ मध्ये लग्न केलं. 
लग्न केल्यानंतर बॉलिवूडच्या नायिकेचं काय होतं, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. काजोलचंही तसंच झालं. करण जोहरच्या आग्रहास्तव केलेला 'कभी खुशी कभी गम' (२००१) वगळता काजोल हळूहळू रूपेरी पडद्यावरून अस्तंगत झाली. त्यातच 'निसा' या कन्येच्या जन्मानंतर तर ती 'संसाराला लागली', असंच वाटलं. पण गेल्या वर्षी 'व्हर्लपूल' आणि नंतर 'टाटा इंडिकॉम'च्या जाहिरातीत पतीसह झळकलेली हसरी काजोल पाहून बरं वाटलं. 'संसार सुखाचा चाललाय', 'मुलगी झाल्याचं मानवलंय' असंही वाटलं. आता हिचं दर्शन जाहिरातींतूनच होणार, असं वाटत असताना अचानक 'फना'ची ती गूढ पोस्टर्स प्रदर्शित होऊ लागली. हळूहळू बातमी फुटली. 'ती' परततेय... चक्क आमीर खानसह. यापूर्वी तिनं आमीरसोबत फक्त इंद्रकुमारचा 'इश्क' केला होता. त्यातही तिचा नायक अजय देवगणच होता. आता मात्र 'फुलफ्लेज्ड' नायिका म्हणून आमीर खानसह. तिची 'फना'मधली 'झूनी अली बेग'ही 'सिमरन'इतकीच लोभस असेल, याची खात्री आहे. तिच्या दुसऱ्या 'इनिंग'मुळे बॉलिवूडमध्ये इतिहास निर्माण झालाय. (लग्न झालेली, तीन वर्षांच्या मुलीची आई हिंदी चित्रपटाची 'नायिका' असू शकते, हे ती सिद्ध करीलच.)

सो! वेलकम सेनोरिटा!

(पूर्वप्रसिद्धी - १८ मे २००६, कलारंजन, सकाळ)
----

8 May 2013

संकल्प - एक 'सोडणे'...



नेमेचि येते थर्टी फर्स्ट
पार्टीमध्ये होतो बर्स्ट
सेलिब्रेशनची बसता किक
झक्कास जाई पहिला वीक
संकल्पांचा असतो सदाचाच फेरा
तीन दिवसांतच वाजतात तीन-तेरा...

...वाहव्वा... वाहव्वा... थर्टी फर्स्टच्या रात्री काय करायचं याचं प्लॅनिंग करण्यासाठी 'बसलेलो' असताना आमच्या कविराज मित्रांना हे काव्य स्फुरलं आणि फेसाळणारे 'चषक बिलोरी' हिंदकाळत, आंदोळत दाद देते जाहले...
नववर्ष आणि कुठले ना कुठले संकल्प या संकल्पनेचा आणि त्यावरून उडणाऱ्या चेष्टेचाही आता एवढा क्लिशे झाला आहे, की यंदा हा विषय कुठंही काढायचा नाही, असंच आम्ही मित्रांनी मनोमन ठरवलं होतं. मात्र, 'बसण्यात बसणं थर्टी फर्स्टचं...' असं म्हणत बसण्याला पुन्हा 'थर्टी फर्स्ट'चीच निवड झाली आणि पाठोपाठ कविमित्राच्या काव्यकळा सुरू झाल्या. त्या सहन करण्याला पर्याय नसतो. ऑफिसमधला डिसेंबरमधला शेवटचा आठवडा आणि या कविमित्राच्या कविता यात मी तरी पहिलाच पर्याय निवडला असता. तिथं निदान त्यागाचा वगैरे महान देखावा तरी करून दाखवता येतो. त्याउलट यमकं जुळवीत केलेल्या या मित्राच्या कविता म्हणजे कहर असतो. कवितेला पाहून पळालो, हे आमच्याबाबतीत वेगवेगळ्या वेळा त्रिवार सत्यच ठरलं आहे. असो. हे थोडं विषयांतर झालं. आता 'बसलेल्या' माणसाच्या विचारांचं आंदोलन हे असंच असतं. 'आला आला...' करेपर्यंत एखादा बरा विचार क्षणात दुसऱ्या टोकाला जाणाऱ्या पंचमीच्या हिंदोळ्यासारखा दूर निघून जातो आणि 'डोळे माझे ओले' होतात! तेव्हा संकल्पाविषयीचे हे हलते-झुलते आणि मधून मधून फुलते विचार आपण चकण्याप्रमाणे टेस्टी मानून घ्याल, अशी अनंत आशा आहे.
नववर्ष आणि संकल्प यांचं नातं हे साधारण ख्रिस्तपूर्व काळापासून असावं. का बरं या दिवशी माणूस भलते-सलते संकल्प सोडत असेल? काही जबरदस्त कॉमन संकल्प आहेत. सिगारेट सोडणे, दारू सोडणे, डायरी लिहिणे, नियमित व्यायाम करणे, जिम जॉइन करणे, लग्न करणे, अजिबात लग्न न करणे, ब्रेकअप घेणे, नवी पोरगी/पोरगा पटविणे, ट्रेकिंगला जाणे, परदेशी सहलीला जाणे, नोकरी मिळविणे आणि नोकरी सोडणे हे तेरा संकल्प सर्वाधिक कॉमन असावेत. या संकल्पांवर सहज नजर टाकली, तरी यातला कुठलाच संकल्प जीवघेणा नाही किंवा जीवनावश्यकही नाही. तरीही माणसं वर्षानुवर्षं हे संकल्प करीत असतात. याचं एकमेव कारण म्हणजे त्याला आयुष्यात काही तरी चेंज हवा असतो. मर्ढेकरांच्या शब्दांत आपण सारे 'सर्वेपि रुटीनः जन्तु' असल्यामुळं आणि चाकोरीच्या त्याच त्या चक्रातून जाताना सवयींचे पक्के गुलाम झाल्यानं आपलं आयुष्य म्हणजे मनमोहनसिंगांच्या चेहऱ्याएवढंच करुण होऊन जातं. मनमोहनसिंग तेरा वर्षांनी एकदा हसतात म्हणे. (ते १९९१ ला पहिल्यांदा हसले. मग २००४ ला पंतप्रधान झाल्यावर पुन्हा एकदा हसले. आता २०१७ मध्येच हसतील. का ते ओळखा पाहू...) तर आपल्या आयुष्यात तेरा वर्षांनी, आणि तोही असा बदल व्हायचा म्हणजे फारच झालं. तेव्हा संकल्पांच्या निमित्ताने तरी काही बदल होतो का हे पाहावं, असा विचार चतुर मंडळी करीत असल्यास नवल नाही. संकल्पांच्या निमित्तानं पहिले आठ-नऊ दिवस खूपच एक्साइटमेंटमध्ये जातात. उगाचच आपण मोदी वगैरे असल्यासारखं वाटतं. गेले वर्षभर ढोणीसारखं वागणारं आपलं नशीब अचानक कुकसारखं शिट्ट्या मारायला लागतं. (म्हणजे असं आपल्याला फक्त वाटतं.) दोन दिवस व्यायाम केला, तरी बाहू चुलबुल पांडेसारखे फुरफुरू लागतात. आता अगदी शर्ट वगैरे निघून येत नाही. (त्यासाठी आपल्या 'रज्जो'ला तो अंगातून ओढूनच काढावा लागेल. आणि म्हणूनच तो सहसा निघत नाही...!) सिगारेट सोडली, तर आपली तब्येत फुकाची सुधारल्यासारखी वाटते. दारू सोडली, तर गरगराट कमी होतो. पोरगी पटविली, तरी अजून दुष्परिणाम ठाऊक नसल्यानं मन मोरपंखी वगैरे होतं... नोकरी लागली, तर अजून दुष्परिणाम ठाऊक नसल्यानं मन पार्टी वगैरे देतं... असं सगळं गोड गोड सुरू असतं. पण हे जास्तीत जास्त भोगी-संक्रांतीपर्यंत... नंतर रथसप्तमीपर्यंत उत्साहाला उतरती कळा लागते आणि फेब्रुवारीतल्या पहिल्या आठवड्यात आणि गेल्या वर्षाच्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आश्चर्यकारक साम्य आढळून येतं. म्हणजे संकल्पांचा बोऱ्या वाजलेला असतो आणि पुन्हा एकदा 'रुटीनः जन्तु' म्हणून चाकोरीतून फिरायला आपली सुरुवात झालेली असते.
त्यामुळे असले (उपरोक्त तेरांपैकी) हुडुत संकल्प करायचेच नाहीत, असा एकच एक दबंग संकल्प आमच्या मित्रांनी आणि त्यांच्यामुळं मी केला आहे. अर्थात आम्हास नावीन्याची सदा ओढ असल्यामुळं काही नवे संकल्प करावेत, असं मनात येऊन त्या दृष्टीनं प्रतिभासाधन सुरूही झालं आहे. उदा. यंदा फेसबुकवर कुण्णाकुण्णाला दुखवायचं नाही, सदैव छान छान, गोड गोड लिहायचं... प्रत्येक गोष्टीला 'लाइक' करायचं असं एक ठरवता येईल. ट्रॅफिकचे नियम पाळायचे असा एक जरासा अवघड; पण शक्य कोटीतला संकल्पही सोडता येईल. पुण्यात शक्यतो सिग्नलला उभं राहायचं आणि त्यातही आपल्याला उजवीकडं वळायचं असेल, तर उजव्याच बाजूला थांबायचं (डावीकडून पुढं येऊन सर्वांसमोर परेड करीत उजवीकडं जायचं नाही) हा महान संकल्प करता येईल. हॉटेलांत भरमसाठ पदार्थांची ऑर्डर देऊन ते पदार्थ तसेच टाकून द्यायचे नाहीत, बेसिनमध्ये नळ सोडून दाढी करायची नाही, होता होईल तो पाणी वाचवायचं, एकदा तरी चांगल्या कामासाठी वेळ आणि पैसा दोन्ही स्वतःहून खर्च करायचा, अरबट-चरबट न खाता सात्त्विक खाणं खायचं (हवं तर त्यासाठी ऑफिसात डबा न्यायचा) असे अनेक जीवनोन्नतीचे संकल्प आपल्याला सोडता येतील.
शेवटी एक... मराठीत संकल्प करण्याला 'संकल्प सोडणे' असं म्हणतात. हा शब्दप्रयोग तयार करणाऱ्यास सलाम... कारण त्यानं नावातच तो 'सोडायची' तजवीज करून ठेवली आहे. वाहव्वा! जय संकल्प!! जय मराठी भाषा!!! 

(पूर्वप्रसिद्धी - पुणे टाइम्स)
--

6 May 2013

आमची दिवाळी पहाट...





ज्या धंद्यात रात्रं थोडी आणि सोंगं फार आणि डे-ड्युटी कमी आणि नाइट शिफ्ट फार अशा पत्रकारितेच्या धंद्यात प्रवेश केला, तेव्हाच रम्य पहाट आणि मनमौजी संध्याकाळ या दोन गोष्टींना आपण कायमचे मुकलो, हे लक्षात आलं. आयुष्यात काही गोष्टी ठराविक वेळेला केल्या, तरच बरं असतं. उदा. काकडआरती ही दुपारी दोनला करून कशी चालेल? किंवा पाणीपुरी संध्याकाळी सहा वाजता जशी लागेल तशी ती दुपारी साडेबाराच्या उन्हात खाऊन कसं जमेल? तसेच लग्न ही गोष्टदेखील वेळेतच करणे इष्ट होय. अन्यथा चाळिशीला लग्न आणि रिटायरमेंटला पोरगं अजून दहावीतच... असली तऱ्हा होऊन काय उपयोग? तर मुद्दा पहाट किंवा संध्याकाळ एन्जॉय करण्याचा आहे. सूर्य डोंगराआडून वर येताना किंवा समुद्रात लुप्त होताना पाहायचा तर आमच्या धंद्यात स्पेशल रजाच टाकावी लागते. आणि रजा काढलीय तर 'झोपू की मस्त' म्हणत सकाळचा सूर्योदय काही पाहायला मिळत नाही तो नाहीच. संध्याकाळचं सुखद वातावरण मात्र आम्ही पुरेपूर उपभोगूच शकत नाही. कारण सुट्टी असली, तरी याचं काय झालं, त्याचं काय झालं असल्या बातम्यांतच आम्हाला जादा रस असतो. तेव्हा या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून गेल्या काही वर्षांत ज्या गोष्टींचं प्रस्थ पुण्यात किंवा महाराष्ट्रातल्या अन्य प्रमुख शहरांत खूप वाढलं आहे, त्या 'दिवाळी पहाट' या कार्यक्रमांना हजेरी लावायचं आम्ही मनोमन ठरवून टाकलं. ही पहाट कधीच साधी नसते.... ती एक तर 'चैतन्याचा झरा' असते किंवा 'सृजनाचा उत्सव' असते... कधी ती 'सप्तरंगी इंद्रधनू' असते, तर कधी ती 'स्वर-शब्द-चित्रांचं शिल्प' असते....! साधारणतः दिवाळीच्या आठ-पंधरा दिवस आधी पेपरांतून या पहाटांच्या जाहिराती झळकू लागतात. मग शहरातली तमाम नाट्यगृहं, लॉन्स आदी बुक झालेली पाहायला मिळतात. आम्ही (बहुदा नरक चतुर्दशीच्या) पहाटे तडमडत कधी नव्हे ते लवकर उठतो आणि आंघोळ... नव्हे, नव्हे, अभ्यंगस्नान उरकून, (लग्नाच्या वेळी घेतलेला आणि फक्त याच दिवसासाठी राखून ठेवलेला) सिल्कचा झब्बा वगैरे घालून, भरपूर अत्तरबित्तर चोपडून तयार होतो. अर्धांगही चक्क साडी नेऊन, गजरा माळून तयार असतं. मग आपण त्या नाट्यगृही पोचतो. तिथं आपल्या आधीच किती तरी पब्लिक जमलेलं असतं. (सगळ्यांत पहिल्यांदा कोण येतं हे एकदा मला शोधायचं आहे...) सनई वगैरे सुरू असते. सगळे टिपिकल चेहरेच असतात. मात्र, सणासुदीला बायका जरा जास्तच नटून (वय लपविण्याचा प्रयत्न करीत) आलेल्या असतात. त्यांच्याकडं पाहण्यासारखं काहीच नसतं. मग आपण मित्रासोबत एखादा कोपरा गाठून गावगप्पा सुरू करतो. तिकडं रंगमंचावर पहाट फटफटू लागलेली असते. दिवाळी पहाट हाच ज्यांचा वर्षभराचा धंदा असतो, अशी माणसं रंगमंचावर दिसत असतात. त्यांची गाणी वर्षानुवर्षं आपण ऐकलेलीच असतात. तरीही त्यांच्या त्याच त्या गाण्यांना, मुरक्यांना लोक पुन्हा पुन्हा दाद देत आपण किती रसिक आहोत, हे चढाओढीनं सांगत असतात. काही काही गायकांचे साथीदारही तेच असतात. दोन गाण्यांच्या मध्ये सांगायचे त्यांचे किस्सेही ठरलेलेच असतात. निवेदकही शनिवारवाड्याएवढेच जुने असतात. पण ते लोकप्रिय असल्याने त्यांना फारच डिमांड असते. त्यांचेही निवेदनाचे साचे ठरलेले असतात. त्यांचेही ठराविक विनोदांचे घाणे पुन्हा पुन्हा काढणे सुरू असते. आपल्याला या साऱ्यांत काही रस नसतो. पण कुठं तरी, काही तरी छान नजरेला पडतं आणि तिकडं पाहत पाहत दिवाळी पहाट सार्थकी लागते.
अशा दिवाळीतल्या बहुतेक 'पहाटा' सारख्याच असतात. काही काळापूर्वी त्याची नवलाई होती. अजूनही खरोखर एखाद्याचं चांगलं गाणं असेल, तर छान वाटतं. बाकी सगळं एवढं टिपिकल आणि बोअर असतं, की त्याला 'क्लिशे' हा शब्द वापरणंही नकोसं वाटतं. अशी ही आमची दिवाळी पहाट... महानगरांतल्या चाकोरीमध्ये अडकलेली... मर्ढेकरांच्या 'सर्वे पि रुटीनः जन्तु' या ओळींची आठवण करून देणारी... पण कधी कधी पहाटेचा थंड वारा मनाला टवटवी आणतो आणि सगळा शिणवटा कुठल्या कुठं पळून जातो... रुटीन असलं, तरी त्यात आपल्या रोजच्या वागण्या-बोलण्यातून चांगला चेंज कसा आणता येईल, याचा विचार मन करू लागतं.... अशा वेळी मग फ्लॅटच्या दारातला आकाशकंदीलही खुशीनं जरा अधिकच लहरतोय असं वाटतं...

(पूर्वप्रसिद्धी - सृजन ई-दिवाळी अंक २०१२)
----

बीस साल बाद...



एखाद्या देशाच्या आयुष्यात वीस वर्षांचा कालखंड म्हणजे तसा फार नव्हे. पण एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात मात्र ही वीस वर्षं फार मोठा काळ मानला जातो. वीस वर्षांत माणूस खूप मोठा पल्ला गाठू शकतो. यशाची शिखरं चढू शकतो, अपयशाच्या गर्तेत अडकू शकतो किंवा सर्वस्वी वेगळा माणूस म्हणूनही समोर येऊ शकतो. भारतात सध्या तिशी-चाळिशीत असलेल्या पिढीनं मात्र एकाच वेळी देशाच्या आणि स्वतःच्या जगण्यात गेल्या वीस वर्षांत एक स्थित्यंतर बघितलं. १९९१ या वर्षात भारतानं आर्थिक उदारीकरणाच्या पदचिन्हांवरून चालायला सुरुवात केली आणि पाहता पाहता पुढील वीस वर्षांत देशात अबोल अशी क्रांती झाली. या खाउजा (खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण) क्रांतीनंतर या देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात फार मोठा बदल घडून आला. विशेषतः मध्यमवर्गाच्या जगण्यात या वीस वर्षांत आमूलाग्र बदल पाहायला मिळाला. बुद्धीच्या जोरावर आपण पैसा मिळवू शकतो, हे या वर्गाच्या ध्यानात आलं. यापूर्वीही पैसा मिळविण्यासाठी या वर्गाला ज्ञानमार्गाचाच आश्रय घ्यावा लागत होता, पण तुलनेत मिळणारा मोबदला हा अगदीच अव्यावसायिक होता. पैसा निर्माण करणारी सारी क्षेत्रं सरकारच्या ताब्यात होती. सुरुवातीला देशाची घडी बसण्यासाठी तेव्हाच्या राजकीय नेतृत्वानं घेतलेला हा निर्णय त्या वेळच्या परिस्थितीत योग्य असेलही, मात्र पुढे-पुढे या व्यवस्थेला जडत्वाची बाधा झाली आणि भ्रष्टाचाराचा संसर्ग झाला. त्यातूनच परमिटराजचा उदय झाला. या व्यवस्थेला गांजलेल्या या वर्गाची अवस्था ठेविले अनंते तैसेचि राहावे अशीच होती. या देशात राहून कुणाचंही भलं होणार नाही, अशी त्यांची खात्रीच पटली होती. म्हणूनच मग युरोप, अमेरिकेकडे आधी शिक्षणाच्या व नंतर करिअरच्या कारणाने या वर्गाचा ओढा वाढू लागला. डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचं आणि यूके किंवा स्टेट्सला सेट्ल व्हायचं, हा या वर्गाच्या सुखाचा मूलमंत्र ठरला.
याच कालखंडात भारतात अवतरलं जागतिकीकरण. त्यापूर्वी दोन वर्षं आधी बर्लिनची भिंत कोसळली होती. युरोपात नवी समीकरणं जुळत होती. सोव्हिएत युनियनची शकलं झाली होती आणि जगातली एकमेव महासत्ता उरलेल्या अमेरिकेनं कुवेतमधल्या तेलाच्या निमित्तानं इराकवर युद्ध लादलं होतं. खुद्द भारतात तर तेव्हा अत्यंत अस्थिर राजकीय वातावरण होतं. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर विक्रमी बहुमतानं सत्तेत आलेल्या राजीव गांधींना त्यांच्या विरोधकांनी बोफोर्स तोफेच्या तोंडी देऊन, १९८९ च्या निवडणुकीत पराभवाची चव दाखवली होती. सत्तेत आल्या आल्या विश्वनाथ प्रताप सिंहांनी मंडल आयोगाचा वणवा देशभर पेटवला होता. त्यातच रामजन्मभूमीच्या वादाचं निमित्त करून उजव्या, हिंदुत्ववादी पक्षांनी देशभर उन्मादी वातावरण निर्माण केलं होतं. लालकृष्ण अडवाणी अश्वमेधाला निघाल्यासारखे रथयात्रेला निघाले होते. मात्र, बिहारमध्ये लालूंनी अडवाणींचा अश्वमेध रोखला आणि अडवाणींना अटक केली. त्याचं निमित्त करून भाजपनं व्ही. पी. सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर अवघ्या ५४ खासदारांच्या जोरावर चंद्रशेखर यांचं सरकार सत्तारूढ झालं. देशाची रिकामी झालेली तिजोरी पाहून या सरकारचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. केवळ सात दिवस पुरेल, एवढीच परकीय चलनाची गंगाजळी देशात शिल्लक होती. अखेर देशातलं सोनं 'बँक ऑफ इंग्लंड'कडं गहाण ठेवून परकीय चलन मिळवावं लागलं. त्यातच चंद्रशेखर सरकारचा पाठिंबा राजीव गांधींनी काढून घेतला आणि दोनच वर्षांत पुन्हा मुदतपूर्व निवडणुकांना देशाला सामोरं जावं लागलं. अर्धी निवडणूक झाली असतानाच राजीव गांधींची हत्या झाली आणि देश पुन्हा अस्थिरतेच्या भोवऱ्यात सापडला. अशा वेळी पी. व्ही. नरसिंह राव यांच्यासारख्या चाणक्यानं देशाची सूत्रं हाती घेतली. अर्थमंत्रिपदावर डॉ. मनमोहनसिंग यांना आणण्याचा निर्णय तेव्हा बऱ्याच जणांना आश्चर्यचकित करून गेला होता. मात्र, मनमोहनसिंगांनी रावांच्या नेतृत्वाखाली देशाची दारं जगाला उघडी करून दिली आणि आपल्याही आयुष्यात एक वेगळं पर्व सुरू झालं.
सर्वप्रथम खासगी दूरचित्रवाणी वाहिन्या आल्या. एरवी फक्त दूरदर्शन एके दूरदर्शन बघायची सवय असलेल्या भारतीय प्रेक्षकांना सीएनएनवरून आखाती युद्ध लाइव्ह बघायला मिळालं. 'झी'च्या रूपानं पहिली खासगी मनोरंजन वाहिनी प्रेक्षकांच्या सेवेत रुजू झाली. पाहता पाहता देशभर केबलचं जाळं विणलं जाऊ लागलं. राजीव गांधींच्या काळात सॅम पित्रोदा यांनी दूरसंचार क्षेत्रात क्रांती करून दाखवली होती. तेव्हा एसटीडी, आयएसडीचे पिवळे बूथ गावोगावी उभे राहिले आणि संपर्क करणं सोपं झालं. नातेवाइकांना फोन करण्यासाठी टेलिफोन बूथवर जावं लागे आणि मिनिटाला अमुक पैसे अशा हिशेबाने पैसे मोजावे लागत, हे आज पंधरा-सोळा वर्षांच्या मुलांना सांगितलं, तर त्यांना ती पाषाणयुगातील कथा वाटेल. पण १९९० च्या आसपास तीदेखील क्रांती म्हणवली जात होती. मात्र, भारतात १९९५ मध्ये मोबाइल अवतरला आणि तो खरा 'गेम चेंजर' ठरला. तत्पूर्वी १९९४ मध्ये सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या राय अनुक्रमे 'मिस युनिव्हर्स' आणि 'मिस वर्ल्ड' ठरल्याने सौंदर्य प्रसाधनांच्या मल्टिनॅशनल कंपन्यांना भारत नावाची अलीबाबाची गुहाच गवसली. पुढच्या काही वर्षांतच भारत अशा सौंदर्य प्रसाधनांची जगातील प्रमुख बाजारपेठ बनला.


मोबाइलनं तर लँडलाइन, पेजर वगैरे मंडळींचा बाजारच उठविला. तरीही त्या काळातले मोबाइलचे २४ रुपये आउटगोइंग आणि १६ रुपये इनकमिंग हे दर आजही अनेकांना थक्क करतील. मात्र, लवकरच या कंपन्यांच्या स्पर्धेतून मोबाइलचा प्रसार प्रचंड प्रमाणात वाढला. आज किमान ८० कोटी मोबाइलधारक या देशात आहेत. आणि अर्थातच बाजारपेठेला विस्ताराला भरपूर वाव आहे. आज थ्री जीच्या जमान्यात आपण येऊन पोचलो आहोत. पुढं हे तंत्रज्ञान कुठं जाईल, हे खरंच सांगता येत नाही. तंत्रज्ञानामुळं पिढीतील बदलाचं अंतर केवळ तीन ते पाच वर्षं एवढं खाली आलं आहे.
दोन हजारच्या आसपास 'वाय टू के प्रॉब्लेम'मुळं भारतातील सॉफ्टवेअर कंपन्यांना एक काम मिळालं. मग डॉटकॉम कंपन्यांची लाटच आली. ती लवकरच विरली. पण लवकरच बंगळूर, पुणे, हैदराबाद, चेन्नई, मुंबई, दिल्ली ही शहरं आयटी कंपन्यांच्या नकाशावर झळकू लागली. आयटी कंपन्यांच्या घोडदौडीमुळं अनेक गुणवान तरुणांना भारतातच करिअरच्या चांगल्या संधी मिळू लागल्या. महानगरं आणखी विस्तारली, तर पुण्यासारखी टु-टिअर शहरं महानगरांच्या दिशेनं वाटचाल करू लागली. जमिनींना भाव आले. बांधकाम क्षेत्राला सुगीचे दिवस आले. सरकारने महामार्ग, उड्डाणपूल, सागरी सेतू अशा पायाभूत सुविधांमध्ये पैसा ओतला. देशात प्रगतीचा असा दृश्यात्मक बदल जाणवू लागला. मध्यमवर्गाच्या हाती पैसा खुळखुळू लागला. पर्यटनाचं प्रमाण वाढलं. पाच दिवस काम आणि दोन दिवस वीकएंडला फुल्ल ऐश हा अमेरिकी फंडा इथेही दिसू लागला. शहरांमध्ये मोठमोठ्या मॉल्सची, मल्टिप्लेक्सची उभारणी होऊ लागली. मध्यमवर्गाला कारची क्रेझ पूर्वीपासूनच होती. आता ती गाडी त्याच्या आवाक्यात आली आणि लगेच त्याच्या पार्किंग लॉटमध्येही दाखल झाली. सोबत सेवा क्षेत्र प्रचंड प्रमाणात विस्तारलं. एवढं की, सरकारला आता उत्पादनशुल्कापाठोपाठ सेवाकरातून सर्वाधिक महसूल मिळू लागला. जगण्याचा स्तर उंचावला.
मात्र, हे होत असतानाच या जागतिकीकरणाचे दुष्परिणामही दिसू लागले. दिवसेंदिवस शेती ओस पडत चालली. खेड्यांची लय बिघडली. स्थलांतराचं प्रमाण वाढून शहरं आणखी बकाल झाली. पायाभूत सुविधांची दाणादाण उडाली. अतिस्पर्धेमुळं कामाचा ताण-तणाव वाढला, त्यातून व्यसनाधीनता वाढली. चंगळवादामुळं नैतिक मूल्यांशी प्रतारणा झाली. कुटुंब व्यवस्थेला आव्हान उभं राहिलं. मनःशांती ढळली. केवळ पैसा आणि पैसा यामागं धावल्यानं दोन घटका निवांत बसणंही माणसांना दुरापास्त झालं. नातेसंबंधांवर परिणाम झाला. सोशल नेटवर्किंग साइटचं फॅड बळावल्यानं व्हर्च्युअल जगात वावरण्याचं व्यसन अनेकांना जडलं. त्यातून वास्तवाचं भान सुटलं आणि पायाखालची जमीनही सरकली.
अशा दुभंग अवस्थेत आज आपण जगतो आहोत. मात्र, परिस्थिती एवढी निराशाजनक नक्कीच नाही. आपल्याला नक्की काय हवं आणि काय नको, याचं भान आपल्यावरील अंगभूत शहाणपणामुळं अनेकांना पुन्हा आलं आहे. अमेरिकेचं आर्थिक मॉडेल फॉलो करताना भारतीय संस्कार सोडून चालणार नाही, हेही आता अनेकांना पटू लागलं आहे. बचतीच्या सवयीमुळं भारत मंदीच्या फेऱ्यातून वाचला, हे जगातले नामवंत अर्थतज्ज्ञही मान्य करीत आहेत. तेव्हा पैसा आणि संस्कार यांचा योग्य मिलाफ घडवून आपण प्रगती करू शकलो, तर पुढची वीस काय, हजारो वर्षं भारतीयांचीच राहतील, यात वाद नाही.

(पूर्वप्रसिद्धी : चपराक दिवाळी अंक २०११)
-------

4 May 2013

काय? बॅट-बॉल? इश्श...!




वर्ल्ड कप सुरू झाल्यानंतर... खरं तर सुरू होण्यापूर्वीच बायकोनं, 'तुम्ही आता रोज मॅच पाहा; मीही पाहते...' असं सांगून धक्काच दिला. इतकंच नव्हे, तर कामाच्या व्यापात गळ्यापर्यंत बुडून गेलेल्या पतिराजासाठी तिनं वर्ल्ड कपचं छानसं वेळापत्रक तयार करून टेबलावर लावलं. भारताच्या मॅचेस असतील, त्या दिवशी पूर्ण रजा काढून घरी निवांत मॅच कशी पाहता येईल, याविषयी प्रेमाची सल्लामसलत झाली. आता धक्के वाढू लागले होते. खास वर्ल्ड कपचे सामने पाहता यावेत, यासाठी तिनं चक्क स्वतःच्या बँक बॅलन्सला धक्का लावून एलसीडी आणायची टूम काढली आणि ती प्रत्यक्षातही आणली. प्रत्यक्ष मॅचच्या वेळी तर तिनं शुचिर्भूत वगैरे होऊन टीव्हीची पूजा केली. सेहवाग जेव्हा बांगलादेशी गोलंदाजीचा खिमा खात होता, तेव्हा अस्मादिकांचं अर्धांगही मुदपाकखान्यातून एक से एक 'लजीज व्यंजन' (हा टीव्हीवरचे खादडीचे हिंदी कार्यक्रम बघितल्याचा परिणाम) आणून आमची रसना तृप्त करीत होतं. इथं आता आपल्याला हृदयविकाराचा धक्का तर बसणार नाही ना, अशी काळजी मला वाटू लागली. त्यानंतर तर कमालच झाली. ती चक्क शेजारी येऊन मॅच बघू लागली. तीही बांगलादेशची बॅटिंग सुरू असताना! वास्तविक शत्रूपक्षाची बॅटिंग सुरू असताना अस्सल क्रिकेटप्रेमीही जरा इकडंतिकडं टंगळमंगळ करतो. थोडंफार सर्फिंग करतो. मात्र, त्या दिवशी हिनं बांगलादेशची बॅटिंग केवळ पाहिली नाही, तर शकीब, कायेस वगैरे मंडळींनी कसं फ्रंटवर खेळलं पाहिजे, फूटवर्क कसं चुकतंय... आदी केवळ क्रिकेट किड्यालाच शोभतील अशा भाषेत चक्क रनिंग काॅमेंट्री सुरू केली. इथं मात्र माझ्यातलं त्राण गेलं आणि डोळ्यांतून चक्क आनंदाश्रू वाहू लागले...
त्या आनंदात डोळे पुसत असतानाच, 'चला, उठा...' ही चिरपरिचित आज्ञा, नेहमीच्या टिपेच्या स्वरात कानी आली आणि काय झालं ते लक्षात आलं... त्या गोड स्वप्नातून जागं झाल्यावर एक गोष्ट मान्य केलीच पाहिजे, की एक अशी नॉर्मल वगैरे, चारचौघींसारखी आपली बायको आहे आणि तिला क्रिकेट अतोनात आवडतं, ही काही फारशी शक्य कॅटॅगरीतली गोष्ट वाटत नाही! मुळात हे काही जमणारं रसायनच नव्हे. जसं एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत तसं! नवऱ्याचा जीव ज्या (मोजक्या काही) गोष्टींसाठी वेडापिसा होतो, ती गोष्ट बायका मनातल्या मनात सवतीच्या जागी कल्पून त्यांच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये टाकत असाव्यात. शिवाय काही काही कॉम्बिनेशनची आपण कल्पनाच करू शकत नाही. उदा. राखी सावंत किंवा अजित पवार किंवा पाँटिंग आणि नम्रता (म्हणजे गुण या अर्थी)... किंवा दलेर मेहंदी 'मोगरा फुलला...' म्हणतोय... किंवा भाकरी अन् बासुंदीची डिश... किंवा बिनगॉगलचे करुणानिधी... किंवा पूर्ण साडीतली मल्लिका... तर सांगायचा मुद्दा असा, की (क्रिकेटपटू नसताना) क्रिकेट आवडणारी बायको मिळणं म्हणजे अहोभाग्यच. (किंवा 'अहों'चं भाग्य म्हणा हवं तर!) आता लगेच या मताचे विरोधक (म्हणजे बायकाच) क्रिकेट आवडणाऱ्या पोरींची यादी समोर भिरकावतील. पण पोरींना क्रिकेटपटू आवडतात, क्रिकेट नव्हे! त्यांचे चॉईस ठरलेले असतात. मग इरफान असो किंवा झहीर... युवराज असो की कोहली... तो क्रिकेटपटू बॅटिंग करीत असेल, तोपर्यंत त्याच्या या चाहत्या मॅच पाहतील. किंबहुना युवराज कथक करीत असताना (जे तो हल्ली पीचवरही करतो बऱ्याच वेळा) दिसला, तरी त्यांना फारसा फरक पडत नाही. त्यांच्या इंटरेस्टचा विषय ठरलेला असतो. तेव्हा तो मुद्दा बाद. केवळ येता-जाता 'अय्या, सचिन गेला?.. आता हरणार मग आपण!' एवढं वाक्य भिरकावून आपल्याला काव आणणारी ही जमात क्रिकेटवेडी कशी असणार, हा प्रश्नच आहे. मॅचची स्थिती काय, समोर प्रतिस्पर्धी कोण आहेत, कश्शा-कश्शाचा विचार नाही. मागं एकदा एका सिन्सिअर दिसणाऱया तरुणीनं का कोण जाणे, पण डकवर्थ-लुईस हा ऑस्ट्रेलियात पडणाऱ्या पावसाचा प्रकार असल्याचं सांगून उपस्थितांस फेफरं आणलं होतं. (या न्यायानं इरापल्ली प्रसन्ना हे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याचं आणि कपुगेदरा हे श्रीलंकन नारळाच्या जातीचं नाव असं सांगायला हरकत नाही. - 'कापू दे जरा' म्हटलं तरी चालेल!) पण हे काही वर्षांपूर्वीचं चित्र होतं. आता अर्थात मंदिरा बेदीमुळं क्रिकेट विथ महिला या कॉम्बिनेशनला चांगले दिवस आले आहेत. (लंकन मुलींना 'क्रिकेट विथ माहेला' जास्त आवडेल.) त्यामुळं मुलीही खूप उत्साहात आता क्रिकेट पाहतात. त्यांना खेळातलं तर मुलांपेक्षाही जास्त कळतं. फक्त त्यांचं रूपांतर 'बायको'त झालं, की हे क्रिकेटप्रेम कुठं आटतं, कुणास ठाऊक! कदाचित आपण क्रिकेटला हाड-हूड करायला सुरुवात केली, की मग त्यांना क्रिकेटप्रेमाचं भरतं येईल...
(आपल्याला क्रिकेट कळतं, असा दावा असणाऱया समस्त माता-भगिनींची आगाऊच माफी चाहतो...)

- घरचा वीरू 

---
(पूर्वप्रसिद्धी - पुणे टाइम्स)

---

किचन कॅबिनेट...




लग्न झालेल्या चार पुरुषांची मैत्री असेल, तर त्यांच्या बायका आपोआपच मैत्रिणी होतात. काही पर्यायच नसतो त्यांना! एकदा का आपला नवरा या बाकीच्या तीन-चार जणांचा घट्ट मित्र आहे, हे त्यांना कळलं, की मग त्या परिस्थितीशी जमवून घेतात. नवं लग्न असेल, तर एकमेकांच्या घरी जाणं, एकत्र ट्रिपला जाणं, फिरायला जाणं किंवा अनेक सुख-दुःखाच्या गोष्टी शेअर करणं हे सुरुवातीला खूप उत्साहात होतं. आमचं कसं छान चाललंय हे दाखवण्याची या काळात सगळ्यांची स्पर्धाच असते. वागण्यात नाही म्हटलं, तरी किंचित औपचारिकता असते. बायकोच्या तर सोडाच, पण नवऱ्याच्या घरच्यांविषयीही या ग्रुपमध्ये फारसं बोललं जात नाही. सगळ्या प्रकाराला नव्या कपड्यांना किंवा नव्या फ्लॅटला असतो, तसा नवेपणाचा खास वास असतो. मित्राच्या बायकांशी आपलंही असं थेट बोलणं नसतं. त्यांच्यातही तो खास वहिनीपणा मुरलेला नसतो. त्यामुळं मित्राच्या घरी गेलं, की त्याच्या बायकोनं केलेल्या पदार्थांची वारेमाप स्तुती करणं, घर कसं मस्त आवरलंय, ड्रेसचा सेन्स किती छान आहे वगैरे बोलणं होतं. आपली बायकोही या नव्या मैत्रिणीला प्रोत्साहन देते. तिला मदत करते. विशेषतः पार्टीनंतर चहा किंवा सरबत आणणं असल्या कामात हमखास आपली बायको तिच्या किचनमध्ये शिरून तिला मदत करते. आपण इकडं नेहमीप्रमाणं बेसावध असतो. मित्राबरोबर (नेहमीप्रमाणे) कुठल्या तरी तिसऱ्याच बाईविषयी रंगून बोलत असतो. अशा वेळी आपल्या सौं.चा मित्राच्या किचनमध्ये झालेला प्रवेश पुढं क्या 'गुल खिलानेवाला है' याविषयी आपण अगदीच अनभिज्ञ असतो. मग कधी तरी आपण मित्राला घरी बोलावतो. अशा वेळी त्याची बायको तिची जत्रेत हरवलेली जुळी बहीण भेटावी, तशा ओढीनं आपल्या बायकोला भेटते. दुसऱ्याच क्षणी आपली सौ. तिला किचनमध्ये घेऊन जाते. आपण पुन्हा मित्राबरोबर तिसऱ्या (नाही, आता चौथ्या) बाईविषयी दिवाणखान्यात बोलत बसतो आणि इथंच घात होतो. या बायकांच्या अशा किचन भेटी वाढत जातात आणि मग त्या दोघींचा/तिघींचा/चौघींचा/पाच जणींचाच स्वतंत्र ग्रुप जमतो. हे 'किचन कॅबिनेट' नंतर आपल्यासकट आपल्या जीवाभावाच्या मित्रांवर राज्य करायला लागतं. नंतर नंतर तर त्यांच्याच पार्ट्या ठरायला लागतात. त्या परस्पर मोबाईलवर एकमेकींशी बोलायला लागतात. त्यांच्या चर्चेचा विषय काय असतो, हे सांगायला ज्योतिषांची मुळीच गरज नसते. आपले नवरे आणि एकूणच त्यांचं घराणं हाच तो विषय. सुरुवातीचा औपचारिकपणा किंवा खोटं खोटं वागणं सगळं आता गळून पडलेलं असतं. एकदा किचनमध्ये शिरल्यावर खोटं वागताच येत नाही म्हणा. त्यामुळं घरोघरी मातीच्याच चुली असतात, याची खात्री या किचन कॅबिनेटला पटलेली असते. एकूणच आपल्या मित्रांविषयी आपल्याला जे जे काही माहिती असतं, त्यापेक्षा बरीच जास्त माहिती हे कॅबिनेट आपापल्या सख्यांना देत राहतं. आणि त्यांचा निष्कर्ष ठरलेला असतो - यांच्याकडून काही होणार नाही. आपल्यालाच सगळं पाहावं लागणार आहे पुढं! यात स्वतःच्या करिअरपासून ते पोरांच्या करिअरपर्यंतचा प्रवास गृहीत धरलेला असतो. नवऱ्यात आता काही सुधारणा होणे नाही, ही केस हातातून गेलेलीच आहे... केवळ मी आहे म्हणून चाललंय अशा आशयाच्या चर्चांची देवाण-घेवाण रंगते. त्यातही सासर आणि सासूबाई हा विषय आला तर काय विचारता... गॉसिपची नुसती गंगा वाहते. आणखी बऱ्याच नाजूक गोष्टींवरही कानगोष्टी होतात आणि नंतर त्या चुकून आपल्या कानावर आल्या, तर आपणच कानकोंडले होतो. तर ते असो.
पण मुळात आम्हा मित्रांचे धागे मस्त जुळलेले असतात आणि अशा निखळ मैत्रीत काहीच लपवून ठेवायचं नसतं. त्यामुळंच खऱ्याखुऱ्या वहिनीपेक्षा ही अशी मानलेली वहिनी म्हणा किंवा बहीण म्हणा किंवा मैत्रीण म्हणा, अधिक खरी वाटते, जिव्हाळ्याची वाटते. नवऱ्याच्या मित्रांच्या आवडी-निवडी लक्षात ठेवून त्यांना सर्व्ह करणारी, त्यांचे लाड करणारी, स्वतःच्या नवऱ्यासोबत नंतर आपल्यालाही थेट टोमणे मारणारी, तर कधी कौतुक करणारी ही मित्राची बायको खरोखर आपली मैत्री जगवते, टिकवते. या निखळ नात्यात कधी खळ न पडो, एवढंच रामरायाकडं मागणं...

- मिस्टरांचे जी. डी. 

(पूर्वप्रसिद्धी - पुणे टाइम्स)

आले अन् गेले!



बॉलीवुडला दर शुक्रवारी नवे नायक-नायिका मिळत असतात. इथं कुणाचं नशीब कधी फळफळेल आणि कोणाचं कधी ढासळेल हे काही सांगता येत नाही. बॉलिवुडला असलेलं अफाट ग्लॅमर बघता, आपणही हिरो व्हावं, हिरॉइन व्हावं असं स्वप्न आपल्या देशातल्या करोडो तरुण-तरुणींना रोज पडावं यात नवल नाही. मुंबई नावाच्या या मायानगरीत आपलं नशीब काढायला रोज शेकडो स्वप्नाळू तरुण-तरुणींचे जथे सीएसटीवर उतरत असतात. अनेक दिवस स्ट्रगल करून, स्टुडिओंचे उंबरे झिजवून, निर्माता-दिग्दर्शकाची दाढी खाजवून एक चान्स द्या असं सांगणारे शेकडो भावी हिरो-हिरॉइन या मॅक्झिमम सिटीत अक्षरशः घोंघावत असतात. सिनेमात काम करायला मिळावं, म्हणून या मुला-मुलींना काय तडजोडी कराव्या लागतात, याच्या सुरस कहाण्या सगळ्यांनाच ठाऊक आहेत. एवढं करूनही योग्य संधी मिळतेच असं नाही. त्यामुळं किमान एक फिल्म तरी मिळावी, ती रिलीज व्हावी यासाठी काहीही करायला ही मंडळी तयार असतात. काही जण अधिक भाग्यवान असतात. त्यांनी चित्रपटसृष्टीतल्या स्थापित दिग्गजांच्या पोटी जन्म घेतलेला असतो. त्यामुळं स्टारपुत्र किंवा स्टारपुत्री म्हणून त्यांचं धडाक्यात लाँचिंग होतं. पण अभिनयगुण नसतील, तर पहिल्या फिल्मपुरतंच त्यांचं हे पदार्पण गाजतं. शशी कपूरचा मुलगा करण कपूर, राजेंद्रकुमारचा मुलगा कुमार गौरव, जानी राजकुमारचा मुलगा पुरू राजकुमार, अनुपम खेरचा मुलगा सिकंदर ही काही वानगीदाखल नावं.
वन फिल्म वंडर असलेल्या हिरोंची संख्या काही कमी नाही. भाग्यश्रीचा नवरा हिमालय याला तर केवळ तिच्यामुळंच दोन-तीन चित्रपटांत काम करायला मिळालं. भाग्यश्रीची तेव्हा एवढी क्रेझ होती, की लोकांनी तिची ही हिमालयाएवढी चूक सहन केली. अर्थात आडात नाही तर पोहऱयात कुठून येणार, या न्यायानं त्याची 'अभिनयक्षमता' लोकांना कळलीच आणि दोन-तीन चित्रपटांनंतर दोघांचीही सद्दी संपली. गुलशनकुमारचा भाऊ किशनकुमार याचंही नशीब जोरावर होतं. त्यानंही दोन-तीन चित्रपटांत हिरोगिरी केली. चांगल्या चांगल्या गाण्यांवर किशनकुमारचा चेहरा पडद्यावर गाताना पाहिला, की चांगल्या झाडावर माकडंच चढतात, या उक्तीची आठवण यायची. आणखी काही दिवस तो हिरो म्हणून दिसला असता, तर लोकांनी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करून त्याचं काम थांबवलं असतं, याची खात्री आहे.

आणखीही काही उदाहरणं आहेत. तो आफताब शिवदासानी हल्ली काय करतो? हा एके काळी बऱयापैकी पोटँशिअल असलेला चेहरा वाटला होता. पण आता पूर्णपणे गायब झालाय. मल्लिका शेरावतचा 'ख्वाहिश' हा पहिला चित्रपट त्यातल्या सतराशेसाठ चुंबनदृश्यांसाठी गाजला होता. पण मल्लिकाच्या ओठांना ओठ भिडवणारा हिमांशू मलिक नावाचा वळू कोणाला आठवतोय? पण पुन्हा तेच. चांगलं झाड आणि माकड... मध्यंतरी रामू वर्माला वेडाचे झटके येत होते, तेव्हा त्यानं 'जेम्स' नावाचा एक शेण चित्रपट काढला होता. त्यातला मोहित अहलावत नावाचा सांड आता कुठं नाहीसा झाला, कुणास ठाऊक! लोखंडवाला कॉम्प्लेक्समधल्या कुठल्या तरी जिममध्ये नोकरी करीत असेल कदाचित... आशिष चौधरी, सिद्धार्थ, सुशांत, सुदेश बेरी ही मंडळी हिरो होती, हे कुणाला आज सांगून तरी पटेल? आणि ही अगदी जाता जाता आठवलेली नावं आहेत. असे आणखी किती तरी जण तुम्हाला आठवतील... किंवा कदाचित नाहीदेखील आठवणार... कारण आवर्जून आठवावं असं कर्तृत्व त्यांनी दाखवलं असतं, तर ते असे नामशेष झालेच नसते.
गेल्या आठ-दहा वर्षांत बॉलिवुडचं कार्पोरेटायझेशन झाल्यापासून कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात चित्रपटनिर्मिती वाढविली. त्यात मल्टिप्लेक्स कल्चरमुळं स्मॉल बजेट चित्रपटांचं प्रस्थही वाढलं. अशा चित्रपटांतून अनेक नवे चेहरे दर शुक्रवारी भेटायला येऊ लागले. एक मात्र आहे... विनय पाठक, इरफान, रजत कपूर अशा एरवी जबरदस्त क्षमतेच्या, पण पारंपरिक हिरो पठडीत न बसणाऱ्या चेहऱ्यांनाही याच चित्रपटांमुळं हिरो बनता आलं...!
बॉलिवुड म्हणजे पैशांचा खेळ. तेव्हा ज्याच्याकडं नशीब नाही, अभिनयक्षमता नाही, पण पैसे आहेत, तो इथं एका फिल्मपुरता का होईना, हिरो बनू शकतो. मात्र, लोकांच्या मनात स्थान मिळण्यासाठी इतर काही गुणांची आवश्यकता असते, हे या मंडळींना कधी कळणार
?

(पूर्वप्रसिद्धी - पुणे टाइम्स)

3 May 2013

यक्ष


देव आनंद गेला... असा रविवारी सकाळीच एसेमेस आला आणि पहिला विचार मनात आला, की अरेरे, अकाली गेला... ८८ हे काय वय होतं त्याचं जाण्याचं? देव आनंद किमान पावणेदोनशे वर्षं जगेल, अशी खात्री होती. ८८ हे आपल्यासारख्या सामान्यजनांसाठी वृद्धत्वाचं वय असेल... पण देव आनंद नावाच्या अजब रसायनासाठी नाही. तो वरचा देव या भूलोकीच्या देवाला घडविताना त्यात वृद्धत्व घालायला विसरला असावा. त्यामुळंच देव आनंद लौकिकार्थानं, वयाच्या हिशेबानं वाढला असेल, पण मनानं तो पंचविशीच्या पुढं कधीच गेला नाही. म्हणून तर आत्ता या वर्षी त्याचा 'हम दोनो' पन्नास वर्षांनी रंगीत होऊन झळकला आणि त्याच वेळी 'गँगस्टर' हा त्याचा नवा-कोरा सिनेमाही रिलीज झाला. त्यातही 'हम दोनो'च अधिक चालला हे वेगळं सांगायला नको. देव आनंदसाठी जसं त्याचं वय पंचविशीला फ्रीज झालं होतं, तसं प्रेक्षकांसाठीही तोच 'हर फिक्र को धुएं में उडाता चला गया' म्हणणारा देवच आठवणींत कायमचा फ्रीज झाला होता. स्वतः देवला याची फिकीर नव्हती. 'हर फिक्र को धुएं में उडाता चला गया' हेच त्याचं जीवनविषयक तत्त्वज्ञान होतं. एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीची किती पराकोटीची पॅशन असावी, याचं देव हे जितंजागतं उदाहरण होतं. देव सिनेमासाठी होता आणि सिनेमा देवसाठी... दोघांनीही परस्परांची साथ शेवटपर्यंत सोडली नाही. त्यामुळंच त्याच्या नव्या सिनेमांच्या पोस्टरवर नातीपेक्षा लहान वयाच्या नायिकांना कवेत घेऊन उभा राहिलेला देव कधीही खटकला नाही.
देव आनंद ही काय चीज होती? एव्हरग्रीन, चॉकलेट हिरो, बॉलिवूडचा ग्रेगरी पेक (खरं तर ग्रेगरीला हॉलिवूडचा देव आनंद का म्हणू नये?), समस्त महिलांच्या हृदयाची धडकन अशा विविध नामाभिधानांनी ओळखलं जाणारं हे प्रकरण नक्की काय होतं? पन्नासच्या दशकानं हिंदी चित्रपटसृष्टीला दिलेल्या तीन महानायकांपैकी देव एक होता. राज कपूर आणि दिलीपकुमार हे बाकीचे दोघं. पुण्यात प्रभात स्टुडिओत उमेदवारी करणारा आणि 'लकी' चाय-बनमस्का खायला येणारा, केसांचा कोंबडा असलेला देव आनंद नावाचा हा देखणा युवक पुढं समस्त चित्रसृष्टीवर साठ वर्षांहून अधिक काळ राज्य करतो याचं रहस्य काय? एक तर देव आनंदचं पडद्यावरचं व्यक्तिमत्त्व सदाबहार, प्रसन्न असायचं. त्याचा अभिनय अगदी महान दर्जाचा होता, असं नाही, पण स्वतःला छान प्रेझेंट करायला त्याला जमायचं. शिवाय तो देखणा होताच. साठच्या दशकात त्यानं केलेल्या सिनेमांमुळं रोमँटिक हिरो हे बिरुद त्याला आपोआपच येऊन चिकटलं. त्याचं ते हातवारे करीत गाणी म्हणणं, त्याचा तो केसांचा कोंबडा, मिश्कीलपणे नायिकेच्या मागे गोंडा घोळणं या सगळ्यांतून देवचा नायक साकारायचा. जेव्हा सिनेमा हे एकमेव मनोरंजनाचं साधन होतं, त्या काळात भारतातल्या तमाम महिलांच्या हृदयस्थानी हे महाशय का विराजमान झाले असतील, याचा सहजच तर्क बांधता येतो. देव आनंदनं प्रेक्षकांना रोमँटिकपणा म्हणजे काय, हे शिकवलं... व्यवस्थित टापटीप राहणं, उत्कृष्ट फर्डं इंग्रजी बोलणं आणि सुंदर स्त्रीवर मनसोक्त प्रेम करणं या गोष्टी (तत्कालीन) भारतीय तरुणाई कुणाकडून शिकली असेल, तर फक्त 'देवसाब'कडून...
... कारण देव आनंद नट असला, तरी शिकलेला होता. इंग्रजी साहित्याचा पदवीधर होता. त्याला गीत-संगीताची उत्तम समज होती. त्याचे भाऊ चेतन आनंद आणि विजय आनंदही तसेच बुद्धिमान होते. पन्नास-साठच्या दशकातल्या, स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या पायावर धडपड करून उभ्या राहणाऱ्या, तरुण रक्तानं सळसळणाऱ्या भारताचं देव आनंद हे प्रतीक होतं. 'गाइड'सारख्या अभिजात साहित्यकृतीवर या बंधूंनी तयार केलेला सिनेमाही याची साक्ष आहे. पडद्यावर अतिविक्षिप्त किंवा वाह्यात प्रकार त्यांनी कधी केले नाहीत. पुढं 'हरे रामा हरे कृष्णा'सारखा सिनेमा दिग्दर्शित केल्यावर देवला आपण मोठे दिग्दर्शक आहोत, याचा 'साक्षात्कार' झाला. त्यानंतर आतापर्यंतचा त्याचा प्रवास केवळ थक्क होऊन पाहत राहण्यासारखा होता. चार-पाच वर्षांपूर्वी पुणे आंतरराष्ट्रीय महोत्सवात आला होता, तेव्हा पत्रकार परिषदेत त्याच्या नातवांच्या वयाच्या पत्रकार पोरा-पोरींसमोर त्यानं केलेली तुफान बॅटिंग लक्षात राहिलीय. त्याचे नवे सिनेमे, त्याच्या पत्रकार परिषदा, त्या सिनेमांचं प्रदर्शित होऊन पडणं हे सगळं पब्लिकच्याही अंगवळणी पडलं होतं. दर वेळेला एवढी अफाट एनर्जी कुठून आणतो हा माणूस, असा एकच प्रश्न पडायचा. आताही वाटतंय, की देव आनंदचं शरीर फक्त गेलं... पण यक्ष कधी मरतात का?

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स)
----