29 May 2023

पासवर्ड दिवाळी अंक २२ - कथा

सर रघू विश्वेश्वरय्या..
------------------------

दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आणि रघूनं जोरदार उडी मारून आनंद व्यक्त केला. यंदा त्याला दिवाळीच्या सुट्टीत दिल्लीला फिरायला जायचं होतं. त्याचे आई-बाबा आणि सोबत त्याचा लाडका मित्र साहिल पण असणार होता. साहिलही रघूसारखाच सातवीत होता. साहिलचे आई-बाबाही अर्थातच सोबत असणार होते. या काकांकडं मोठ्ठी एसयूव्ही होती, म्हणून त्या गाडीतून गोव्याला जायचं ठरत होतं. मात्र, रघूला रेल्वेनं प्रवास करायला आवडायचं. त्यामुळं गोव्याचा बेत रद्द होऊन दिल्लीला जायचं ठरलं होतं. रघूनं हट्टानं बाबांना रेल्वेगाडीची तिकिटं काढायला सांगितली होती. त्याच्या बाबांनी वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेसचं तिकीट काढलं. एसी डब्याचं तिकीट वेटिंगवर होतं. वेटिंग म्हणजे काय, आरएसी म्हणजे काय, कन्फर्म म्हणजे काय, पीएनआर म्हणजे काय या सगळ्या प्रश्नांनी रघूनं बाबांना भंडावून सोडलं. रेल्वेगाडीतून एका वेळी साधारण हजार लोक प्रवास करू शकतात. रेल्वे डब्यांचे प्रकार असतात. जनरल डबा, आरक्षित थ्री टायर स्लीपर, सेकंड एसी आणि फर्स्ट क्लास असे वेगवेगळे डबे असतात. त्यातल्या सेवासुविधांनुसार त्यांची तिकिटं वेगवेगळी असतात. रेल्वेगाडीचं आरक्षण म्हणजेच रिझर्वेशन चार महिने आधी करता येतं. मात्र, सणासुदीच्या आणि सुट्टीच्या दिवसांत लोक खूप जास्त प्रवास करतात, त्यामुळं गाड्यांना गर्दी असते. अनेक लोक आधी तिकीट आरक्षित करतात आणि नंतर काही कारणानं रद्द करतात. त्यामुळं अनेक लोक ‘वेटिंग’वरचं, म्हणजे प्रतीक्षा यादीतील तिकीट घेऊन ठेवतात. नशीब चांगलं असेल, तर हे तिकीट कन्फर्म होतं आणि तुम्हाला प्रवास करता येतो अशी सगळी माहिती रघूच्या बाबांनी त्याला दिली. तरी रघूची उत्सुकता शमत नव्हती. मग त्यानं ‘यू ट्यूब’वर रेल्वेगाड्यांचे खूप व्हिडिओ पाहिले. रेल्वेचं हे एक वेगळंच जग असल्याचं त्याच्या लक्षात आलं. भारतात रेल्वेचं केवढं मोठ्ठं जाळं आहे, हे बघून त्याला फार भारी वाटलं. राजधानी एक्स्प्रेस गाड्यांच्या शर्यतीचे व्हिडिओ बघून तर तो हरखून गेला. दोन गाड्या अशा एकाच वेळी दोन ट्रॅकवरून एकाच दिशेनं धावतात, हे त्यानं यापूर्वी कधीही बघितलं नव्हतं. हल्ली स्मार्टफोन आल्यापासून कुणीही व्हिडिओ करू शकत असल्यानं रेल्वे प्रवासाचे हजारो व्हिडिओ यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आले होते. रघूला ते व्हिडिओ बघायचा नाद लागला. अनेक परदेशी प्रवाशांनी भारतात प्रवास करून त्याचे व्हिडिओ केले होते. त्यांच्या नजरेतून आपला देश बघताना रघूला गंमत वाटत होती. आता उत्सुकतेनं रघूनं भारतातल्या रेल्वेचा इतिहास वाचायला सुरुवात केली. भारतात १८५३ मध्ये पहिली रेल्वेगाडी बोरिबंदर ते ठाणे या स्थानकांदरम्यान धावली ही माहिती त्याला समजली. पुणे आणि मुंबई दरम्यानचा रेल्वेचा अवघड घाट इंग्रजांच्या काळात कसा तयार झाला, हेही त्यानं वाचलं. रघूनं आत्तापर्यंत अनेकदा पुणे ते मुंबई प्रवास रेल्वेनं केला होता. त्याची एक मावशी मुंबईत राहायची. मात्र, या रेल्वेमार्गावर लागणारे बोगदे आणि त्यातून काढलेला हा लोहमार्ग याची माहिती वाचताना त्याचे डोळे विस्फारले. भारतातील सर्वांत लांब धावणारी रेल्वे हिमसागर एक्स्प्रेस आहे आणि ती काश्मीरमधील जम्मूपासून निघून थेट दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत जाते, हे वाचून रघूनं नकाशाच काढला. त्या लांबलचक प्रवासाचा मार्ग त्यानं पेन्सिलनं नकाशावर पुन्हा एकदा काढला. त्या एक्स्प्रेसला दिलेलं समर्पक नाव वाचून त्याला फारच खास वाटलं. हिमालयातून निघून थेट खाली हिंदी महासागरापर्यंत जाणाऱ्या त्या एक्स्प्रेसनं आयुष्यात एकदा तरी प्रवास करायचा असा निश्चय त्यानं करून टाकला. आता त्याला वेगवेगळ्या एक्स्प्रेस गाड्यांची नावं जाणून घ्यायची उत्सुकता लागली. मुंबईहून कोलकत्याला जाणाऱ्या गाडीला गीतांजली एक्स्प्रेस, तर पुण्याहून कोलकत्याला जाणाऱ्या एक्स्प्रेसला आझादहिंद एक्स्प्रेस असं नाव का दिलं असेल, हे त्याच्या लक्षात आलं. इतिहास हा त्याचा आवडता विषय होता. पुण्याहून जम्मूकडं जाणाऱ्या गाडीला झेलम एक्स्प्रेस, तर मुंबईहून भुवनेश्वरला जाणाऱ्या गाडीला कोणार्क एक्स्प्रेस असं नाव आहे, हे त्याला समजलं. मुंबईहून सावंतवाडीला जाणाऱ्या एक्स्प्रेसला ‘तुतारी एक्स्प्रेस’ असं नाव दिल्याचं ऐकल्यावर त्याला फार आनंद झाला. ज्येष्ठ कवी केशवसुत यांच्या प्रसिद्ध अशा ‘तुतारी’ या कवितेचं नाव गाडीला दिल्यामुळं त्याला मराठी साहित्याचा आणि साहित्यिकांचा अभिमान वाटला. पुण्याहून अहमदाबादला जाणाऱ्या गाडीचं नाव ‘अहिंसा एक्स्प्रेस’, तर मुंबईवरून बंगळूरला जाणाऱ्या गाडीचं नाव ‘उद्यान एक्स्प्रेस’ असं आहे, हे वाचल्यावर आता त्याला आश्चर्य वाटलं नाही.
रघू ज्या वास्को-निजामुद्दीन गाडीनं जाणार होता, त्या गाडीविषयी तो बाबांना विचारू लागला. वास्को हे गोव्यातलं एक शहर आहे आणि तिथून ही रेल्वेगाडी दिल्लीला पुणे मार्गे जाते, असं त्याला बाबांनी सांगितलं. गाडी दिल्लीला जाणार आहे तर ‘निजामुद्दीन’ हे काय आहे, असा त्याला प्रश्न पडला. मग त्यानं ‘गुगल’बाबाला विचारलं. तेव्हा ‘हजरत निजामुद्दीन’ हे दिल्ली शहरातील एक मोठं स्टेशन आहे, असं त्याला कळलं. ही गाडी पहाटे चार वाजता पुण्यात येते. त्यामुळं रघूला तर कधी जायचा दिवस उजाडतो (खरं तर मावळतो...) असं होऊन गेलं. अखेर प्रवासाला निघण्याचा दिवस आला. रघूनं सगळी जय्यत तयारी केली होती. थंडीचे दिवस असल्यानं ‘हुडी’वालं जर्किन, शूज, हँड्सफ्री इअरफोन, खिशात कॅडबरी असा सगळा जामानिमा करून तो सज्ज झाला. साहिल आणि त्याची फॅमिली परस्पर स्टेशनवर येणार होते. रघूच्या बाबांनी कॅब बुक केली. खूप उशिरा स्टेशनवर जाण्यापेक्षा रात्री बारा वाजताच स्टेशनवर जायचं असं त्यांनी ठरवलं होतं. कॅब आली. रघूच्या घरापासून स्टेशन ४५ मिनिटं दूर होतं. रात्री ११.२० ला निघालेली कॅब बरोबर १२ वाजून १० मिनिटांनी रेल्वे स्टेशनच्या आवारात शिरली. समोरच महात्मा गांधींचा भव्य पुतळा दिसला. पुणे स्टेशनची जुनी दगडी इमारत दिव्यांनी झगमगून निघाली होती. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्टेशनला तिरंगी दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळं ही मूळची देखणी इमारत आणखीन झळाळून उठली होती. आता या इमारतीविषयी त्याच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. आता बाबाला त्रास द्यायचा नाही, हे त्याला माहिती होतं. त्याऐवजी ‘गुगल’बाबाला विचारायचं; अजिबात कटकट न करता तो उत्तर देतो, हे त्याला ठाऊक झालं होतं. त्यानं लगेच ‘पुणे रेल्वे स्टेशन’ असा सर्च दिला. त्याबरोबर स्टेशनची सगळी माहिती त्याच्या मोबाइलवर अवतरली. हे स्टेशन १९२५ मध्ये बांधून पूर्ण झालंय हे वाचून त्याला आश्चर्य वाटलं.
रघू आणि त्याचे आई-बाबा आता स्टेशनमध्ये शिरले. एवढ्या रात्रीही स्टेशनच्या बाहेर व आत भरपूर गर्दी होती. वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत-जात होते. त्यात भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतांतले लोक दिसत होते. वेषभूषा मात्र बहुतेकांची सारखीच होती. थंडीमुळं अनेकांच्या अंगात स्वेटर, कार्डिगन, जर्किन्स होती. त्यात मात्र वैविध्य दिसत होतं. स्टेशनवर सगळीकडं इलेक्ट्रॉनिक फलक लावले होते आणि त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांची माहिती प्रदर्शित होत होती. स्टेशनवर हल्ली बऱ्यापैकी स्वच्छता असते, असं रघूला दिसून आलं. कचरा इकडेतिकडे न फेकता लोक कचराकुंडीत टाकत होते. विशेषत: लहान मुलं त्यांच्या खाण्याची रॅपर्स न चुकता कचराकुंडीला (तिथं हिंदीत ‘कूडादान’ लिहिलं होतं...) दान करत होती. तिथं खाण्याचे स्टॉल होते. त्यासमोर उभं राहून बरेच लोक तिथले पदार्थ खात होते. वडापावला नेहमीप्रमाणेच भरपूर डिमांड होती. तिथं एक पुस्तकांचाही स्टॉल होता. पण तिथली पुस्तकं बरीचशी हिंदीत होती. काही इंग्रजीत होती. मात्र, रघूच्या बाबांनी त्याला सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचं एक चरित्र दिलं होतं. ते त्याला या प्रवासात वाचायचं होतं. आत्ता त्यांची कॅब ‘सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या उड्डाणपुला’वरूनच आली होती. नुकतीच शाळेत १५ सप्टेंबरला विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीदिनी त्यांची माहिती त्याच्या शिक्षकांनी सांगितली होती. रघूला ती ऐकून विश्वेश्वरय्या यांच्याविषयी आणखी कुतूहल वाटू लागलं होतं. कधी एकदा ते पुस्तक वाचतो असं त्याला झालं होतं.
थोड्याच वेळात साहिल आणि त्याचे आई-बाबाही आले. मग रघूचे आई-बाबा आणि साहिलचे आई-बाबा गप्पा मारत बसले. साहिल आणि रघू यांनी एकमेकांना बघताच मिठी मारली. दोघांनीही हँड पंच केला आणि ‘यो...’ असं ओरडले. रघूला बसून बसून लगेच कंटाळा आला होता. मग जरा स्टेशनवर चक्कर मारून येऊ का, असं त्यानं बाबांना विचारलं. त्यावर बाबांनी ‘साहिल आणि तू बरोबर जा आणि मोबाइल सतत हातात ठेव’ असं सांगून परवानगी दिली. स्टेशनच्या बाहेर जायचं नाही आणि रुळ क्रॉस करायचे नाहीत, अशीही सक्त ताकीद त्यांनी दिली. चहा घ्यावासा वाटला, तर थोडे पैसेही रघूकडं दिले. रघू आणि साहिल हातात हात घालून निघाले. स्टेशनवरचं ते रंगबिरंगी, हलतं-फिरतं जिवंत जग रघूला फार आवडलं. तो स्टेशनवरच्या माणसांचं निरीक्षण करू लागला. सगळ्याच लोकांकंडं स्वेटर नव्हते, असं त्याच्या लक्षात आलं. प्रत्येकाकडचं सामानही वेगवेगळं होतं. कुणी वळकट्या बांधल्या होत्या, तर कुणाकडे चाकांवर पळणाऱ्या भारी बॅगा होत्या. कुणाकडं अगदी साध्या पिशव्या होत्या, तर तरुण मुलांकडं काळ्या सॅक होत्या. कुणी भारी भारी शूज घातले होते, तर काहींजवळ अगदी साध्या स्लीपर होत्या. काही जण मोठ्या ग्रुपने प्रवास करत होते, तर कुणी कुणी अगदी एकटे होते. एक मात्र होतं. बहुतेक सर्वांकडं मोबाइल होते आणि त्यातले ९० टक्के लोक मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसले होते. रघू आणि साहिलला थोड्याच वेळात कंटाळा आला आणि ते आई-बाबांकडं परत आले. आता रात्रीचे दोन वाजले होते. स्टेशनवरची गर्दी थोडी कमी झाली होती.
रघूला बाबांनी दिलेल्या मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांच्या चरित्राची आठवण झाली. त्यानं सॅकमधून ते पुस्तक काढलं. त्यांच्या एका मोठ्या बॅगेवर बसून आणि स्टेशनवरच्या खांबाला टेकून तो ते पुस्तक वाचू लागला. विश्वेश्वरय्या यांच्या अद्भुत जगण्याविषयीचं त्याचं कुतूहल कमी न होता वाढतच होतं. पुण्यातल्या खडकवासला धरणाचं कामही त्यांनीच केलंय हे रघूला माहिती नव्हतं. तो उत्सुकतेनं पुस्तक वाचत होता; पण डोळे कधी पेंगू लागले ते कळलंच नाही. एकदम बाबा ‘रघू, उठ, उठ... गाडी आली...’ असं ओरडून म्हणताहेत असं त्याला वाटलं. त्याचे डोळे उघडले. स्टेशनवरची गडबड वाढली होती. त्यांची गाडी फलाटावर लागली होती. त्यांची तिकिटं कालच कन्फर्म झाली होती. गाडी पकडायला सगळ्यांची एकच झुंबड उडाली. रघूही झोपाळलेल्या अवस्थेत बाबांचा हात धरून गाडीकडं निघाला. आपण कधी डब्यात चढलो, कधी आपल्या बर्थवर आडवे झालो, हे रघूला काहीही आठवलं नाही. थोड्याच वेळात गाडी हलल्याचं त्याच्या लक्षात आलं. रघू सर्वांत खालच्या बर्थवर झोपला होता. त्यानं आग्रहानं ही खालची सीट मागून घेतली होती. त्यानं खिडकीबाहेर बघितलं. स्टेशनवरची माणसं, दिवे भराभर मागं पडत चालले होते. आता गाडीनं चांगलाच वेग घेतला होता. रेल्वेगाडीची स्वत:ची अशी एक लय असते. गाडीत बसल्यावर थोड्याच वेळात सगळ्यांच्या अंगात नकळत ती लय भिनते. रघूच्याही तारा गाडीच्या तारांशी जुळल्या. थोड्याच वेळात त्याचे डोळे मिटले. गाडीचा ‘ढिडक ढिडक ढिडक ढिडक ढगढगढगढगढग ढिडक ढिडक ढिडक धिडक धिडक...’ हा आवाज मात्र त्याच्या कानात व मेंदूत घुमत राहिला.
अचानक रुळांमधून वेगळाच, काही तरी घासल्यासारखा आवाज येऊ लागलाय, असं रघूला वाटू लागलं. त्यानं डोळे उघडले. कान पुन्हा सीटला लावले. मगाशी येत होता त्यापेक्षा वेगळा आवाज येत होता, असं त्याला जाणवलं. मग त्याला अचानक असं वाटलं, की या रेल्वेमार्गावर पुढं रुळांमध्ये काही तरी बिघाड असला पाहिजे. रुळ कदाचित तुटलेही असतील. मग रघू उठला. त्यानं आजूबाजूला बघितलं. सगळे लोक गाढ झोपले होते. मग रघू खाली उतरला. आता त्यानं डब्याच्या फ्लोअरलाही कान लावला. त्याला पुन्हा तेच जाणवलं. काही तरी गडबड आहे. अशा वेळी चेन ओढून गाडी थांबवायची, हे त्याला माहिती होतं. रघूनं पुढचा-मागचा कुठलाही विचार न करता वर चढून जोरात चेन ओढली. गाडी थांबली. पण विशेष म्हणजे आजूबाजूचं कुणीही जागं झालं नाही. ते लोक, अगदी त्याचे आई-बाबा अगदी गाढ झोपले होते. गाडी एका निर्जन भागात थांबलीय असं लक्षात येत होतं. बाहेर अर्थात दाट अंधार होता. थंडीमुळं धुकंही पसरलं असावं. गाडीतही ते धुकं आलं होतं. त्या धुक्यातून अचानक एक माणूस त्याच्या दिशेनं येताना दिसला. तो माणूस थेट विश्वेश्वरय्यांसारखा दिसत होता. या रेल्वेत दाक्षिणात्य मोटरमन असावा, अशी रघूनं स्वत:ची समजूत करून घेतली. त्या माणसानं रघूला थेट इंग्रजीत विचारलं, ‘व्हॉट हॅपन्ड माय बॉय? व्हाय डिड यू पुल द चेन?’ रघूनं त्याला आलेली शंका सांगितली. तो माणूस चिंतेत पडला आणि लगेच माघारी गेला. थोड्या वेळात त्या डब्यात रेल्वेचे बरेच अधिकारी लोक आले. ‘इथे रघू नावाचा मुलगा कुठे आहे?’ असं त्यांच्यातला एक जण विचारत होता. रघू पुढं झाला. गंमत म्हणजे अजूनही आजूबाजूचे लोक झोपलेलेच होते. त्या अधिकारी माणसानं रघूला सांगितलं, की त्याच्यामुळं या गाडीतील हजार लोकांचे प्राण वाचले आहेत. पुढे एक-दीड किलोमीटरवर खरंच रुळांना तडे गेले होते. त्यामुळं गाडीला मोठा अपघात झाला असता. त्यामुळं आम्ही रघूचं कौतुक करतो आणि त्याचं नाव राष्ट्रपती शौर्यपदकासाठी सुचवतो.
रघूला अतिशय आनंद झाला. पुढच्याच मिनिटात तो राष्ट्रपती भवनात होता. विशेष म्हणजे राष्ट्रपतीही त्या विश्वेश्वरय्यांसारखेच दिसत होते. त्यांनी रघूला शौर्यपदक बहाल केलं. ते घेऊन रघू पळतच बाबांकडं आला. बाबांना पदक दाखवण्यासाठी त्यानं गळ्यापाशी हात नेला, तर पदक नव्हतंच. रघू अतिशय दचकला. पुन्हा पुन्हा गळ्यापाशी, छातीपाशी पदक आहे का, ते चाचपत राहिला. ‘बाबा, पदक गेलं.... पदक हरवलं...’ असं म्हणून रडायला लागला.
‘रघू, रघू... उठ बेटा... कसलं पदक? काय हरवलंय...’ बाबांच्या आवाजानं रघू आता खराखुरा जागा झाला. बाहेर उजाडलं होतं. गाडी वेगानं धावतच होती. रघूनं डोळे चोळत एकदा खिडकीबाहेर आणि एकदा बाबांकडं बघितलं. बाबांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होतं.
‘बाबा, काही नाही झालं. चहा घेऊ या... ’ रघू हसत बाबांना म्हणाला.
‘विचित्रच आहे जरा पोरगं,’ अशा अर्थाचा लूक देऊन बाबा चहावाल्याकडं वळले. इकडं रघूनं सीटला कान लावून पुन्हा एकदा गाडीची लय ऐकली.
‘ढिडक ढिडक ढिडक ढिडक ढगढगढगढगढग ढिडक ढिडक ढिडक धिडक धिडक...’
...ती अगदी ‘नॉर्मल’ होती. पलीकडं उशाशी विश्वेश्वरय्यांचं चरित्र पडलं होतं. रघूला सगळा उलगडा झाला. त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. पुस्तकावरचे विश्वेश्वरय्या आजोबाही त्याच्याकडं बघून मिश्कील हसत आहेत, असा भास त्याला झाला... गाडी वेगानं दिल्लीकडं पळत राहिली...

----

(पूर्वप्रसिद्धी - पासवर्ड दिवाळी अंक २०२२)

---

8 May 2023

महाराष्ट्र शाहीर - रिव्ह्यू

मराठी मातीचा ‘डीएनए’
------------------------------


महाराष्ट्र म्हणजे काय, मराठी माती म्हणजे काय, मराठी माणसाचा ‘डीएनए’ नक्की कसा आहे हे जाणून घ्यायचं असेल तर केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा नवा मराठी चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने बघायलाच हवा. शाहीर कृष्णराव साबळे यांच्या आयुष्यावरील हा ‘बायोपिक’ शाहिरांच्या आयुष्याची कथा तर सांगतोच; पण त्याहून अधिक तो विसाव्या शतकातील महाराष्ट्राचं चित्र आपल्यासमोर मांडतो. आज जातीपातींच्या विद्वेषाने सगळे वातावरण दूषित झालेले असताना तर हा चित्रपट बघणे विशेष गरजेचे आहे, याचे कारण ‘कोण होतास तू, काय झालास तू’ अशी अवस्था मराठी माणसाची झाली आहे. अशा परिस्थितीत आपलं राज्य कसं होतं, इथं काय उंचीची माणसं होऊन गेली, त्यांनी या भूमीसाठी - मराठी मातीसाठी - काय काय केलं हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळं ‘महाराष्ट्र शाहीर’मधला शाहीर साबळेंच्या जगण्याचा प्रवास पाहताना आपल्या राज्याविषयीचा अभिमान दाटून येतो.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून छोट्या किस्नाचा प्रवास दिग्दर्शक दाखवतो. वाईजवळच्या पसरणी गावचे हे साबळे कुटुंब. छोट्या किस्नाला लहानपणापासून गाण्याची आवड असते. वडील शेतकरी. सोबत देवळात कीर्तन करणारे. आईला वाटतं, मुलानं केवळ गाणं म्हणत बसू नये. त्यानं काही पोट भरणार आहे का? भाबडी माउली मुलाला हर प्रकारे गाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असते. मुलगा जरा मोठा झाल्यावर त्याच्या मामाकडं व आजीकडं खानदेशात अंमळनेरला पाठवते. तिथं लहानगा कृष्णा सानेगुरुजींच्या आणि संत गाडगेबाबांच्या सहवासात येतो. तेव्हाचे सगळेच प्रसंग अतिशय हृद्य आहेत. या दोन महापुरुषांच्या सान्निध्यामुळे कृष्णाच्या जगण्याला एक दिशा मिळते आणि तो पुन्हा गावाकडं परततो. तारुण्यात पदार्पण केल्यावर आई कृष्णाला त्याच्या काकासोबत मुंबईला धाडते. काका पुतण्याला गिरणी कामगार म्हणून एका सूतगिरणीत चिकटवतो. कृष्णा गाणं विसरून एक सर्वसामान्य कामगार म्हणून मुंबईत दिवस कंठू लागतो. मात्र, त्याच्या नशिबात काही वेगळंच लिहिलेलं असतं. मुंबईत त्याला पुन्हा एकदा सानेगुरुजी भेटतात. गुरुजी कृष्णाला त्याच्या जगण्याचं प्रयोजन सांगतात. त्यानंतर मात्र कृष्णा एक दृढनिश्चय करून संपूर्ण आयुष्य शाहिरीला, गाण्याला वाहून घेण्याचं ठरवतो. 
त्याच प्रवासात फलटणला एका कॉलेजातील कार्यक्रमात त्याला भेटते भानुमती. भानुमतीला कृष्णाबाबत ‘प्रथमदर्शनीच प्रेमात’ असं होतं. तिच्या आयुष्यात प्रीतीचा मधुमास फुलतो. त्या काळात, १९४२ मध्ये ही मुलगी कृष्णासोबत पळून येते. पसरणीच्या ग्रामदैवताच्या उत्सवात सगळ्या गावकऱ्यांसमोर कृष्णा भानुमतीशी लग्न करतो. ‘बामणाची पोरगी पळवून आणली,’ म्हणून सगळं गाव तोंडात बोट घालतं. नानीची (आई) प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणेच विरोधाची असते. समजूतदार वडील मात्र आशीर्वाद देतात आणि वेगळं बिऱ्हाड करायला सांगतात.
‘माझं काव्य आणि तुमचा आवाज’ मिळून आपण कला क्षेत्र गाजवू, असं भानुमती कृष्णाला सतत सांगत असते. कृष्णालाही तिच्या कलेची कदर असते. मात्र, पुढं गोष्टी बिनसत जातात आणि भानुमती कृष्णापासून दुरावते. कृष्णाचा पुढचा सगळा प्रवास म्हणजे एका साध्या-सुध्या माणसाचं रूपांतर ‘महाराष्ट्र शाहिरा’त होण्याचा प्रवास आहे. केदार शिंदे अत्यंत आत्मीयतेनं आणि कौशल्यानं हा सगळा प्रवास आपल्याला दाखवतात.
शाहीर साबळे एका कार्यक्रमासाठी रशियाला जातात. तिथं पत्रकार त्यांची मुलाखत घेतात आणि फ्लॅशबॅकमधून आपल्याला सगळी कथा उलगडत जाते. चित्रपटाची सुरुवातच ‘आकाशवाणी’वर अय्यर नावाच्या अमराठी अधिकाऱ्याकडून शाहिरांना ‘महाराष्ट्र’ शब्द वारंवार उच्चारू नका, अशा दरडावण्याने होते. त्यानंतर शाहीर रेकॉर्डिंगच्या वेळी काय करतात, हे चित्रपटातच बघायला हवं. 
महाराष्ट्राच्या लोकसंगीतात एक मोठा काळ गाजविणाऱ्या शाहिराचा जीवनपट अडीच तासांत दाखवणं कठीण आहे. मात्र, केदार शिंदे हे आव्हान अतिशय कौशल्यानं पेलताना दिसतात. त्यांच्या आजोबांचाच हा चरित्रपट असल्यानं त्यांची यातली भावनिक गुंतवणूक जाणवते. जोडीला अजय-अतुल यांचं बहारदार संगीत असल्याने चित्रपट बघताना कुठे क्षणभरही कंटाळा येत नाही. 
चित्रपटात काही त्रुटी आहेत. झेंड्याबाबतच्या, तसेच कला दिग्दर्शनातला (त्या काळात नसलेल्या वस्तू दिसणे वगैरे) काही चुका जाणवतात. मात्र, सिनेमाचा वेग चांगला असल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करून कथेत गुंतून राहतो. कास्टिंगबाबत काही त्रुटी जाणवतात. बाळासाहेब ठाकरेंची भूमिका छोटी असली, तरी तो कलाकार बाळासाहेब म्हणून अजिबातच शोभत नाही. तसंच सानेगुरुजींच्या पात्राचं. तुलनेत गाडगेबाबा जमले आहेत.
शाहीर साबळे चरित्रनायक असले, तरी त्यांची ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमा चितारण्याचा मोह दिग्दर्शकाने टाळला आहे आणि त्यांना हाडामांसाचा, आपल्यासारखाच एक माणूस दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे अभिनंदनीय! नाही तर एरवी चरित्रनायक हा इतरांपेक्षा महान दाखवण्याच्या नादात लॉजिकचं भान अनेकदा सुटतं. तसं इथं झालेलं नाही. शाहिरांच्या आयुष्यात आलेल्या आई, भानुमती, मालती कदम आणि मुली चारुशीला व वसुंधरा या सर्व स्त्री-व्यक्तिरेखा विशेष लक्षात राहणाऱ्या झाल्या आहेत. विशेषत: आईची भूमिका करणाऱ्या शुभांगी सदावर्ते यांनी कमाल केली आहे. त्यांना यापूर्वी ‘देवबाभळी’ नाटकात पाहिलं होतं. यात त्यांनी मुलाच्या गाण्याला विरोध करणारी, मात्र त्याचं भलं व्हावं म्हणून सतत झटणारी आणि मुलगा मोठ्ठा शाहीर झाल्यावर आपली चूक सहज कबूल करणारी नानी फार लोभस साकारली आहे.

दुसरं कौतुक करायचं ते सना शिंदेचं. केदार शिंदेंच्या या लेकीनं भानुमतीची तुलनेनं अवघड अशी भूमिका ताकदीनं पेलली आहे. भानुमती यांच्याविषयी मला आधी काहीच माहिती नव्हतं. बहुसंख्य प्रेक्षकांचं तसंच असणार. अशा परिस्थितीत ही भूमिका नकारात्मकतेकडं झुकू न देता, उलट तिच्याविषयी सहानुभूती वाटावी, अशा संतुलित पद्धतीनं रंगवणं हे सोपं काम नव्हतं. मात्र, केदार शिंदेंनी आपल्या लेकीकडून चांगलं काम करवून घेतलं आहे. आजीच्या छोट्याशा भूमिकेत निर्मिती सावंत आपला ठसकेबाज ठसा उमटवून जातात. अंकुश चौधरीनं शाहीर साबळेंची भूमिका अतिशय उत्तमरीत्या साकारली आहे. तरुण वयातल्या कृष्णापासून ते वयोवृद्ध शाहिरांपर्यंतचा या व्यक्तिरेखेचा प्रवास त्याने अभ्यासपूर्ण सहजतेनं उभा केला आहे. अंकुशच्या कारकिर्दीतील ही एक महत्त्वाची भूमिका ठरावी.
सिनेमाचं संगीत अप्रतिम आहे. मला ‘मधुमास’सोबतच ‘गाऊ नको रे किस्ना’ विशेष आवडलं. बाकी सर्व शाहिरी ढंगाची आणि शाहीर साबळेंनी लोकप्रिय केलेली ‘या विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’, ‘मला दादला नको गं बाई’, ‘विंचू चावला,’ ‘हे पावलंय देव माझा मल्हारी’, ‘अंबाबाई गोंधळाला ये’, ‘जेजुरीच्या खंडेराया जागराला या या’, ‘मी तर होईन चांदणी’, ‘या गो दांड्यावरनं’ आदी सगळीच गाणी एक से एक झाली आहेत. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे तर कळसाध्यायाचं गाणं. त्यात मध्येच शाहीर साबळेंचा ओरिजनल ट्रॅक वापरण्याची कल्पना दाद देण्यासारखी! एकूणच या चित्रपटाचं ध्वनिआरेखन आमचे मित्र मंदार कमलापूरकर यांनी भन्नाट केलं आहे.
या चित्रपटात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा संदर्भ आहे. यशवंतराव चव्हाणांसोबतचा एक प्रसंग शाहिरांच्या राजकीय जाणिवेचं दर्शन घडवणारा आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर बाळासाहेब ठाकरेंची व शाहिरांची भेट व त्यातून ‘आंधळं दळतंय’ या तेव्हा अतिशय गाजलेल्या व वादग्रस्त ठरलेल्या नाटकाची निर्मिती हा सगळा प्रवास उत्तरार्धात येतो. रुमादेवी यांच्याकडून कलकत्त्यातील महोत्सवाला आलेलं आमंत्रण आणि तिथं मिळालेल्या जोरदार प्रतिसादानंतर मुली वसुंधरा व चारुशीला यांनी केलेली ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या अजरामर व तुफान लोकप्रिय कार्यक्रमाची निर्मिती हा सगळा भाग आपल्याला उत्तरार्धात दिसतो. 
शाहिरांच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान असलेल्या राजा मयेकरांचा ट्रॅकही व्यवस्थित येतो. राजा बढे व श्रीनिवास खळे यांच्यासोबत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ गाण्याच्या ध्वनिमुद्रणाचा प्रसंगही यात आहे. त्यात शाहीर साबळे हे गाणं शाहीर अमर शेखांच्या आवाजात ध्वनिमुद्रित व्हायला हवं, असं आग्रहानं सांगतात. अर्थात गाणं शेवटी शाहीर साबळेंकडूनच गाऊन घेतलं जातं. अशा अनेक लहान-मोठ्या ऐतिहासिक महत्त्वाच्या प्रसंगांची गुंफण या चित्रपटात आहे. हे संदर्भ ज्यांना ठाऊक आहेत, त्यांना ते बघताना विशेष आनंद होतो. ज्यांना ते माहिती नाहीत, त्यांना त्याविषयी कुतूहल वाटून, त्यांनी महाराष्ट्राचा इतिहास अधिक नेमकेपणानं जाणून घेतला तर ते या सिनेमाचं यश असेल.
आज महाराष्ट्रात सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात अधोगती होताना दिसतेय. राजकीय क्षेत्राचं तर विचारायलाच नको. अशा वेळी सर्व जाती, धर्म, प्रादेशिक वाद या सर्वांपलीकडे जाऊन मराठी मातृभाषा असणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाला हात घालण्याची ताकद असणारा एक मोठा लोकशाहीर आपल्या भूमीत होऊन गेला, हे सर्वांना माहिती असायला हवं. त्या जोडीला आपलं हे राज्य नक्की कोणत्या मुशीतून घडलंय, आपला वारसा नक्की कोणता आहे, आपल्या मराठी मातीचा ‘डीएनए’ काय आहे याचा थोडा फार अंदाज या कलाकृतीतून येतो. त्यामुळे सर्व मराठी माणसांनी, विशेषत: आपल्या पुढच्या पिढीला घेऊन हा चित्रपट नक्की बघायला हवा.

----

दर्जा - साडेतीन स्टार

---