30 Nov 2019

चिंतन आदेश दिवाळी २०१९ - लेख

जीवन त्यांना कळले हो...
-----------------------------


माणूस जन्माला आल्यापासून कुणाच्या ना कुणाच्या तरी प्रभावाखाली वाढत असतो. कुणाच्याही प्रभावापासून मुक्त असा माणूस मिळणं कठीणच. आपल्यावर सगळ्यांत आधी आपल्या आईचा व नंतर वडिलांचा प्रभाव पडत असतो. अगदी सुरुवातीपासून याच दोन व्यक्ती आपल्याबरोबर असतात. हे रक्ताचं नातं असल्यानं तो प्रभाव शारीरिक व मानसिक असा दोन्ही पद्धतींनी होतो. नंतर महत्त्वाचा प्रभाव पडतो तो आपल्या भावंडांचा. त्यातही मोठा भाऊ किंवा बहीण असेल तर त्यांचा प्रभाव जास्त पडतो. अनेकांच्या आयुष्यात आई-वडिलांच्या जोडीनं त्यांच्या मोठ्या भावाचा किंवा बहिणीचा प्रभाव महत्त्वाचा असल्याचं दिसून येतं. सचिन तेंडुलकर व त्याचा मोठा भाऊ अजित हे याचं ठळक उदाहरण सांगता येईल. सख्ख्या भावंडांनंतर मग चुलत, मामे, मावस अशी भावंडं, त्यानंतर काका, मामा, मावशी, आत्या, काकू, मामी अशी नाती येतात. हे सगळे लोक अगदी लहानपणापासून आपल्यासोबत असल्यानं त्यांच्यापैकी कु णाचा तरी प्रभाव आपल्यावर पडणं अगदी सहज शक्य असतं. यातल्या कुणाला तरी वाचनाची आवड असते, कुणाला वाद्य वाजविण्याचा छंद असतो, तर कुणाला भटकंतीचा... या सगळ्यांचा आपल्यावर कळत-नकळत प्रभाव पडत असतो. त्यानंतर आपल्या आयुष्यात येणारी महत्त्वाची प्रभावशाली व्यक्ती म्हणजे आपले गुरू, शिक्षक. अनेकांच्या आयुष्यात शिक्षकांचा वाटा फार महत्त्वाचा असतो. शिक्षक अनेक विद्यार्थ्यांचं जीवन अक्षरशः 'घडवत' असतात. शाळेतले, महाविद्यालयांतले सर्व शिक्षक आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकत असतात. याशिवाय आपण आयुष्यात ज्यांना कधीही भेटलो नाही, अशा व्यक्तींचाही प्रभाव आपल्यावर पडू शकतो. यात इतिहासातील व्यक्तिरेखा असतात, तसेच आपल्या जन्मापूर्वी होऊन गेलेल्या व्यक्तीही असतात. यात छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत आणि अल्बर्ट आइन्स्टाइनपासून ते महात्मा गांधींपर्यंत हजारो व्यक्तिश्रेष्ठ येऊ शकतात. याशिवाय आपल्या काळातच वावरणाऱ्या, पण आपण त्यांना कधीही भेटू शकू अशी शक्यता नसलेल्याही व्यक्ती आपल्यावर प्रभाव पाडत असतात. यात अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, सुनील गावसकर अशांची नावे सांगता येतील. काही जणांचं आयुष्य अगदी वेगळं, विलक्षण असतं. अशा व्यक्तींचे अनुभव ऐकून आपल्याला त्यांचा हेवा वाटतो. तसं जगावंसं वाटतं. अशा व्यक्तींच्या जीवनशैलीचाही आपल्यावर नकळत प्रभाव पडतो.
माझ्या आयुष्यावर वर उल्लेख केलेल्या प्रत्येक घटकाचा कमी-अधिक प्रभाव पडला आहे. आई-वडील, लहानपणीचे शिक्षक हे आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाचे गुरू व प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती असतातच. त्यामुळे मी ते गृहीत धरूनच पुढे लिहितो. आमच्या गावी एक उत्तम दर्जाचं वाचनालय होतं. त्यामुळं अगदी लहानपणापासूनच मला वाचनाची गोडी लागली. बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं 'महाराज' हे पुस्तक वाचून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी कुतूहल निर्माण झालं. एवढं उत्तुंग व्यक्तिमत्त्व या महाराष्ट्रात होऊन गेलं, याचा अभिमान दाटून आला. पुढं महाराजांविषयी विपुल लेखन वाचण्यात आलं. या आभाळाएवढ्या माणसाबद्दलचा आदर वाढतच गेला. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव एवढा विलक्षण होता, की त्यांच्या जीवनातले एकेक पैलू समजून स्तिमित व्हायला होतं. अजूनही कुठल्याही किल्ल्यावर, गडावर गेलो, की तिथल्या मातीला महाराजांचे चरणस्पर्श झाले असतील, या भावनेनं ऊर दाटून येतो. सिंधुदुर्ग किल्ल्यात महाराजांची पावलं बघून असेच डोळे भरून आले होते. मायमाउलीसारखी रयतेची काळजी घेणारा हा राजा केवढ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आयुष्य झुंजला, हे बघून मी सदैव नतमस्तक होतो. माणसांची अचूक पारख, जीवाला जीव देणारा दिलदार स्वभाव, प्रसंगी दोन पावलं माघार घेण्याचं चातुर्य आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे आईचं स्वप्न साकार करण्यासाठी तळहातावर शिर घेऊन उभ्या आयुष्याचीच केलेली झुंज या सगळ्याच गोष्टींमुळं महाराज मोठे झाले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव कायम आहे आणि राहील.
पुढं पुस्तकं वाचत असताना अनेक लेखकांच्या लिखाणाने प्रेरित झालो. पण माझ्यावर सर्वाधिक प्रभाव पडला तो विनोदी वाङ्मयाचा. यात चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, द. मा. मिरासदार अशा अनेक लेखकांचे नाव सांगता येईल.
पण त्यातही माझ्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव कुणा एका व्यक्तीचा पडला असेल, तर तो पु. ल. देशपांडे यांचा. केवळ लेखक पुलं नव्हेत, तर पुलंच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचाच तो प्रभाव होता. अर्थात संपूर्ण महाराष्ट्रच पुलंच्या प्रेमात होता व त्यांना 'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असं बिरुदही लाभलं होतं. तेव्हा माझ्यावरचा प्रभाव फार काही वेगळा म्हणता यायचा नाही. पण हा प्रभाव कसा पडत गेला, याची थोडी चिकित्सा जरूर करता येईल.
पुलंची पुस्तकं वाचताना सर्वांत प्रथम लक्षात आली ती एक गोष्ट. त्यांचं बहुतांश लेखन हे कथा किंवा कादंबरी या स्वरूपात नव्हतं. म्हणजे एका साच्यातील काल्पनिकता त्यांच्या लिखाणात नव्हती. त्यांनी जे जे लिहिलं, त्याला वास्तव जगण्याचा एक अदृश्य धागा सदैव गुंफलेला जाणवायचा. त्यामुळंच मुंबईसारख्या शहरात किंवा चाळीत कधीही न राहिलेल्या माझ्यासारख्या मुलाला 'बटाट्याची चाळ'ही भिडली. कल्पनेच्या जगात त्यांनी नेलं, पण ते अशा स्वरूपात! 'अपूर्वाई' व 'पूर्वरंग' हा कित्येक मराठी माणसांनी केलेला पहिला परदेश प्रवास होता. त्याआधी मराठी साहित्यिक परदेशांत गेले नव्हते, असं नाही. पण पुलंनी स्वतःबरोबर आम्हाला तिथं साक्षात फिरवून आणलं. त्यामुळं सुमारे ५०-५५ वर्षांनीही पुलंच्याच या लिखाणाचे संदर्भ संबंधित देशात कुणी गेला तरी आजही लिहिले जातात. 'व्यक्ती आणि वल्ली'सारखं पुलंचं अजरामर पुस्तक फार लहान वयात वाचल्यानं माणसं समजायला मदत झाली. जगात किती वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात आणि त्यांच्यात किती वैविध्य असतं हे पुलंचं लिखाण वाचूनच समजलं. नंतर वय वाढत गेलं, तसं पुलंनी केलेलं गंभीर लेखनही वाचलं. त्यांचे सिनेमे पाहिले, त्यांनी लिहिलेली नाटकं पाहिली, त्यांच्या गाजलेल्या एकपात्री प्रयोगांच्या चित्रफिती नंतर पाहायला मिळाल्या. हे सगळं बघून या माणसाच्या अष्टपैलुत्वाची नव्यानं ओळख घडत गेली. सुनीताबाईंचं 'आहे मनोहर तरी...' हे पुस्तक वाचल्यावर सुरुवातीला सुनीताबाईंचा राग आला होता. पण वयाची प्रगल्भता आल्यानंतर त्या लेखनाचंही मोल कळलं.
मी दहावीत असताना याच पुलप्रेमातून त्यांना पोस्टकार्ड पाठविण्याचं धाडस मी केलं होतं. महिनाभरानं त्यांचं चक्क उत्तर आलं, तेव्हा मला गगन ठेंगणं झालं. मग मी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालो, तेही त्यांना कळवलं. त्यावर त्यांचं अभिनंदनाचं उत्तर आलं. आता तर मला हर्षवायूच व्हायचा बाकी राहिला होता. पुलंचे ते आशीर्वाद घेऊन मी पुण्यात पुढील शिक्षणासाठी दाखल झालो. एके दिवशी रस्त्यावरच्या फोन बूथवरून थेट त्यांच्या घरी फोन लावला. फोन सुनीताबाईंनी उचलला. 'मला भाईकाकांशी बोलायचंय' असं मी चाचरत चाचरत म्हटलं. थोड्या वेळानं साक्षात पुलं फोनवर आले. त्यांनी माझी अगदी हळुवार आवाजात चौकशी केली. मी कुठं शिकतो, काय करतो विचारलं. मी त्यांना सांगितलं, की मला तुमचं साहित्य आवडतं. त्यावर त्यांनी 'काय आवडलं नेमकं' असं विचारलं. मला उत्तर सुचेना. मग मी 'सगळंच आवडतं' असं ठोकून दिलं. एका हातात रुपयाची आणखी दोन कॉइन धरून मी उभा होतो. युनिव्हर्सिटी रोडवरच्या वर्दळीचा आवाज एका बाजूनं मोठमोठ्यानं येत होता. आणि मी रिसीव्हरला लावलेल्या कानात प्राण आणून माझ्या परमदैवताचं बोलणं ऐकत होतं. हे सगळं बोलणं मिनिटा-दीड मिनिटांचं झालं असेल. नंतर त्यांनी हळुवारपणे 'आता मी ठेवतो हं फोन' असं सांगून फोन बंद केला. त्या वेळी पुलंचं वय ७२-७३ असावं. ते खरोखर थकले होते. त्यांचा सार्वजनिक जीवनातला वावर पूर्ण थांबला होता. त्यानंतर मी पुलंना आणखी दोन पत्रं पाठवली. त्याचीही त्यांनी उत्तरं पाठविली. पण पहिल्या पत्रातला मजकूर आता हळूहळू कमी होत गेला होता. अक्षरांतील थरथर वाढली होती. माझ्या आवडत्या लेखकाची ही शारीरिक विकलता मला सहन झाली नाही. मी नंतर त्यांना पत्रं लिहिणं थांबवलं. त्यांना प्रत्यक्ष भेटायला जायची फार इच्छा होती. पण ते कधी जमलं नाही. त्या काळात ते मुळातच खूप थकले होते. सुनीताबाई अगदी मोजके, जवळचे लोक सोडले तर त्यांना बाहेरच्या कुणाला भेटूही देत नसत, असं ऐकू येई. मग त्या धास्तीपोटी कधी जाणं झालंच नाही. पुढं मी 'सकाळ'मध्ये उपसंपादक म्हणून काम करू लागलो. त्यानंतर वर्ष-दोन वर्षातच पुलंची तब्येत खूप खालावली व त्यांना प्रयाग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पुलंचे ते शेवटचे जवळपास आठ-पंधरा दिवस आम्ही काही पत्रकार रोज 'प्रयाग'ला जायचो. मी पुलंना प्रत्यक्ष असं तिथंच पाहिलं. साधारण दहा मीटर अंतरावरून... काचेपलीकडं एका कॉटवर ते झोपले होते व नाकावर ऑक्सिजन मास्क लावला होता. आयुष्यात रंगबिरंगी मुखवटे घालून जगभरातल्या मराठी रसिकांना सतत हसवत ठेवणाऱ्या या अवलियाचं ते तसं दर्शन मात्र मला अगदी असह्य झालं. काही दिवसांनी पुलं गेले. माझ्या ऑफिसमध्ये मला ही बातमी कळली. चारचौघांत रडण्याची एक मध्यमवर्गीय, घाबरट भीती मनात होती. मग ऑफिसबाहेर आलो. शनिवारवाड्याच्या कॉर्नरवरून घरी जाताना अश्रूंचा बांध फुटला. मनसोक्त रडलो. वास्तविक ते जाणार हे जवळपास स्पष्टच झालं होतं. पण तरीही 'ते आहेत' ही गोष्ट समाधान देणारी होती. आता 'ते नाहीत' ही बाब झेपत नव्हती. माझ्या घरात तोपर्यंत माझ्या आजोबांचे व आजीचे मृत्यू मी पाहिले होते. त्यानंतर एवढे अश्रू कुणासाठीही वाहिले नाहीत. ते वाहिले फक्त पुलंसाठी. पुलं शरीरानं नसले तरी त्यांच्या पुस्तकांच्या, चित्रफितींच्या किंवा चित्रपटांच्या, नाटकांच्या रूपानं आपल्यातच आहेत, याची जाणीव नंतर होऊ लागली आणि खूप दिलासा मिळाला. पुढं मी लिहायला लागलो. सदरं लिहिली, चित्रपट परीक्षणं लिहिली, पुस्तकं लिहिली. कुणी कुणी म्हणायचं, तुझ्या लिखाणावर पुलंचा प्रभाव दिसतो. मला आतून बरं वाटायचं. पण नंतर लक्षात यायचं, आपण नकळत त्यांची नक्कल करतो आहोत का? नक्कल करून आपली स्वतःची शैली विकसित होणार नाही. मग प्रयत्नपूर्वक त्या प्रभावापासून दूर जाण्याचा प्रयत्न (फक्त लेखनापुरता) करायला लागलो. मात्र, त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वानं माझ्यावर घातलेली मोहिनी कायमच आहे व राहील.
पुलंनी मला काय दिलं, असा विचार करायला लागलो, तर एखाद्या कॅलिडोस्कोपमधून पाहावं तसे त्यांनी आपल्या जगण्याला दिलेले विविध रंग व आकार दिसू लागतात. मी गेल्या वर्षी लिहिलेलं 'थ्री चीअर्स' हे विनोदी लेखांचा संग्रह असलेलं पुस्तक पुलंनाच अर्पण केलंय. त्यांच्या जन्मशताब्दीत हा योग यावा, हे मला फार मोठं भाग्य वाटतं. या पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलेल्या मनोगतात मी पुलंनी माझ्यावर केलेल्या गारूडाबद्दल लिहिलंय. त्याचा थोडा भाग इथं सांगणं औचित्याचं होईल, असं वाटतं. मी लिहिलंय -

'पुलंनी महाराष्ट्राला निर्मळपणे हसायला शिकवलं. पुलंच्या आधी विनोद नव्हता, असं नाही. मात्र, पुलंनी त्यांच्या आनंदयात्रेसारख्या जगण्यातून हा विनोद नीट समजावून सांगितला. जगण्याकडं पाहण्याची एक अतिशय स्वच्छ, निरोगी दृष्टी दिली. आयुष्य भरभरून जगायला लावणारा मूलमंत्र दिला. खूप लहानपणापासून पु. लं.चं वाचत गेलो आणि जगणं उमगत गेलं. विनोद हा त्यांच्या जगण्यातला केवळ एक भाग होता, हेही कळलं. त्यांची संगीताची आवड, त्यांच्यातला खेळिया, अवलिया चित्रकर्मी, प्रतिभावान रंगकर्मी, कुशल दिग्दर्शक, वक्ता, दाता असे अनेक पैलू नंतर उलगडत गेले आणि या व्यक्तिमत्त्वाविषयीचा आदर वाढतच गेला. एक माणूस आपल्या उण्यापुऱ्या ८० वर्षांच्या आयुष्यात काय काय करू शकतो, याचं पुलंचं आयुष्य हे अत्यंत प्रेरणादायी उदाहरण आहे. पुलंच्या लिखाणातून प्रेरणा घेऊन माझ्यासारखी अनेक मुलं लिहिती झाली आणि याचं संपूर्ण श्रेय त्यांच्या अतिशय नितळ, निखळ, सात्त्विक अशा लिखाणालाच आहे, यात शंका नाही. जगण्यावर विलक्षण प्रेम असल्याशिवाय आणि माणूस म्हणून संपूर्ण विकास झाल्याशिवाय असं लिखाण कुणाच्या हातून लिहून होणार नाही. पुलंनी या मातीवर, मराठी भाषेवर, इथल्या माणसांवर मनापासून प्रेम केलं. जगण्याचं प्रयोजन शिकवलं, कलेचा आस्वाद कसा घ्यावा याचे धडे दिले. गुणग्राहकता कशी असते, हे स्वतःच्या वागणुकीतून दाखवून दिलं. आपणही असं अर्थपूर्ण जगलं पाहिजे, असं त्यांच्या आयुष्याकडं बघून वाटावं, एवढं रसरशीत जगले. पुलंचा विनोद म्हणजे केवळ शाब्दिक कोट्या किंवा शब्दांच्या कसरती करीत साधलेला विनोद नव्हता. जगण्यातली विसंगती टिपत, विसंवादातून नेमका सूर शोधण्याचं कसब त्या विनोदात होतं. त्यांचा विनोद कधीच घायाळ करीत नव्हता. उलट तो निर्विष असा विनोद होता आणि आपल्याला स्वतःवर हसायला शिकवायचा. मराठी जनांच्या मनाची मशागत करीत पु. लं.नी विनोदाची ही दिंडी अभिमानानं आयुष्यभर खांद्यावर मिरविली. ही दिंडी एवढी चैतन्यशील आणि देखणी होती, की मराठी माणूस वारकऱ्यांच्या भक्तिभावाने पुलंच्या मागून विनोदाचे, आनंदाचे गाणे गात गात चालत निघाला. पुलंची ही आनंदयात्रा त्यांच्या ऐहिक अंतानंतरही सुरूच आहे. त्यांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या रक्तात आता हा आनंदयात्री आहे. पुलंच्या मागं निघालेल्या या प्रचंड दिंडीतला, आनंदयात्रेतला मी एक लहानसा वारकरी आहे, यात्रेकरू आहे. त्यांनी दाखविलेल्या सत्त्व व सत्याच्या निखळ मार्गानं वाट चालण्याचा प्रयत्न करतो आहे. या पुस्तकातले हे सगळे लेख म्हणजे या आनंदयात्रेत उधळलेला अबीर-गुलाल आहे. पु. ल. ज्या काळात जगले त्याहून आजचा काळ किती तरी वेगळा आहे. तंत्रज्ञानाची अफाट प्रगती आणि जगण्याचा वाढलेला वेग श्वास गुदमरवून टाकतो आहे. रुढी-परंपरांचे स्खलन आणि मूल्यांची घसरगुंडी रोजची झाली आहे. माणसा-माणसांतला संवाद वाढण्याऐवजी कमी होताना दिसतो आहे. कुटुंब संस्थेवर वेगवेगळ्या माध्यमातून आघात होत आहेत. अशा वातावरणात सकारात्मक भाव मनात ठेवून जगत राहणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. मात्र, पुलंच्या लिखाणातून ही ऊर्जा आपल्याला सतत मिळत राहते. आयुष्याचा एवढा मंगलमय उत्सव साजरा करण्याऐवजी रडत बसू नका, असंच त्यांचे शब्द आपल्याला सतत सांगतात. जगणं साजरं करण्याची ही दृष्टी पुलंनी आपल्याला दिली, हे त्यांचे ऋण कुठलाही मराटी माणूस कधीच विसरू शकणार नाही.'

पुलंचा प्रभाव असा केवळ माझ्यासारख्या एका व्यक्तीवर नव्हे, तर सर्व समाजावर पडलेला आहे. या थोर व्यक्तिमत्त्वाकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. स्वतः पुलंना व्यक्तिपूजेचा तिटकारा होता. मात्र, एखाद्या माणसाच्या गुणांवर ते भरभरून प्रेम करीत. म्हणून तर 'गुण गाईन आवडी'सारखं पुस्तक ते लिहू शकले. महाराष्ट्रातल्या आनंद यादव, दया पवार यासारख्या कित्येक लेखकांना पुलंनी उजेडात आणलं. वैचारिक विचारसरणीनं ते समाजवादी होते. समाजातल्या तळागाळातल्या लोकांविषयी त्यांना आस्था होती. ही आस्था त्यांनी अनेकदा कृतीतून व्यक्त केली होती व लाखो रुपयांच्या देणग्या मुक्त हस्ते दिल्या. पुलं व सुनीताबाईंचं सहजीवनही हेवा वाटावं असं होतं. बोरकरांच्या कवितावाचनाचा कार्यक्रम हे दोघं करीत, तेव्हा महाराष्ट्राचं अवघं सांस्कृतिक वैभव त्या रंगमंचावर अवतरलंय, असं वाटे. कुणी तरी या दोघांना 'महाराष्ट्राचं फर्स्ट कपल' म्हटलंय ते अगदी बरोबर आहे.
आपल्याला असं जगता यावं, असं मला फार थोड्या माणसांविषयी वाटलेलं आहे. पु. ल. हे त्यात अग्रस्थानी आहेत. वयाच्या पन्नाशीत त्यांनी बंगाली शिकायचा ध्यास घेतला म्हणून मीही ती भाषा गिरवण्याचा (अयशस्वी) प्रयत्न केला. पुलंचं मोठेपण पुन्हा एकदा अधोरेखित होण्यापलीकडं त्यातून अन्य काही निष्पन्न झालं नाही. पण एखाद्या व्यक्तीचा आपल्या आयुष्यावर प्रभाव कसा आणि किती असू शकतो, हे सांगण्यासाठीच केवळ ही बाब इथं नमूद केली.
पुलंसारखा आणि त्यांच्याएवढा प्रभाव अद्याप कुणाचाच पडला नसला, तरी वयाच्या एका टप्प्यानंतर आणखीही काही लेखक आवडू लागले. त्यात गौरी देशपांडे व मिलिंद बोकील यांचा उल्लेख करावाच लागेल. या दोन्ही थोर स्त्री-पुरुषांचा माझ्यावर पुष्कळ प्रभाव पडला आहे, असं म्हणता येईल. या दोघांच्याही लेखनातून विशेषतः स्त्री व पुरुष नातेसंबंधांच्या अनेकानेक छटा उलगडत गेल्या. गौरीच्या बाबतीत तर तिच्या लेखनासोबतच तिच्या विलक्षण जगण्याचाही सदैव हेवा वाटत आला आहे. वयाच्या पस्तिशीनंतर मी हे दोन्ही लेखक वाचले, हे एका परीनं बरंच झालं. विशेषतः आपल्या एकारलेल्या, सरळसोट मध्यमवर्गीय जगण्यात गौरी किंवा बोकिलांनी लिहिलेले स्त्री-पुरुष येणं जवळपास दुरापास्तच. तसे अनुभवही गाठीला लाभणं दुर्मीळ. पण जग आपल्यासारखं सरळसोट किंवा एकारलेलं नसतंच. त्यामुळं ते समजून घेण्यासाठी या दोघांचं बोट धरणं गरजेचं होतं. ते वेळीच मिळालं. त्यामुळं स्त्रियांविषयीची माझी टिपिकल, पारंपरिक मतं बदलायला पुष्कळ उपयोग झाला. वयानुसार येणारी प्रगल्भता अनेकांच्या विचारांमध्ये परावर्तित होतेच असं नाही. मात्र, गौरी व बोकील वाचल्यानंतर माझ्या विचारांतही बदल झाला, हे मला मान्य करायला हवं. ते बदललेले विचार माझ्या पुढील लेखनातही आपोआप उतरले. त्यामुळं माझ्या जगण्यावर या दोघांचाही प्रभाव आहे, यात शंका नाही.
क्रिकेट हाही माझा आवडीचा खेळ. अगदी लहानपणापासून हा खेळ बघत आणि खेळत आलोय. क्रिकेटमध्ये माझ्यावर सर्वाधिक प्रभाव पडला तो सुनील मनोहर गावसकर या 'लिटल मास्टर'चा. आमच्या लहानपणी घरी टीव्ही आला तेव्हा टीव्ही सुरू केल्यावर सर्वप्रथम दिसले ते हेच महाशय. सुनील हा आमचा बालपणातला हिरो होता. भारतीय क्रिकेटला सुनील गावसकरनं आत्मसन्मान दिला, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. हेल्मेट न घालता, विंडीजच्या तोफखान्यासमोर उभा राहणारी ही बटूमूर्ती आमच्या अभिमानाचा विषय होती. मला जरा कळायला लागेपर्यंत गावसकर निवृत्तही झाला होता, पण त्याचा थोडा खेळ तरी मी 'लाइव्ह' टीव्हीवर पाहिला आहे. नंतर त्यानं समालोचनात कारकीर्द केली, तीही जोरदार यशस्वी झाली आहे. 'केव्हा थांबावं याचा अचूक निर्णय घेणारा माणूस' म्हणूनही मला गावसकर प्रिय आहे. त्याला मराठीपणाचा अभिमान आहे. पण तरी त्याचं इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व हेवा करावा असं आहे. त्याच्या स्वभावात एक मिश्कीलपणा आहे, तो कॉमेंटरी करत असतानाही सदैव प्रत्ययास येतो. त्याच्या खेळाच्या ज्ञानाविषयी तर काही शंकाच नाही. त्यामुळंच आज सत्तरीतही तो 'आउटडेटेड' झालेला नाही, तर उत्साहानं जगभर फिरत मस्त क्रिकेट व जगणं एंजॉय करत असतो. हे मला फार आवडतं. आपलं म्हातारपण कुणासारखं जावं, तर ते गावसकरसारखं, असंच मला सतत वाटत असतं.
असाच काळावर विजय मिळविणारा आणखी एक उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा माणूस म्हणजे अमिताभ बच्चन. विशेषतः 'सेकंड इनिंग'मधला अमिताभ मला विशेष आवडतो. अमिताभमधला एक कुटुंबवत्सल, सुसंस्कृत माणूस सर्वाधिक भावतो. आपण आयुष्याच्या उत्तरार्धात 'ग्रेस' टिकवून जगावं कसं, तर गावसकरप्रमाणेच अमिताभसारखं असं उत्तर माझं मन कायम देतं. अमिताभचं आयुष्यही विलक्षण चढ-उतारांनी भरलेलं आहे. त्यात वैयक्तिक आनंदाचे क्षण आहेत, तशीच दुःखंही आहेत. पण हा माणूस सगळ्या गोष्टींना हसतमुखानं सामोरा गेला आणि आजही किती तरी सहकारी कलाकारांपेक्षा जास्त बिझी आहे. अमिताभ 'आदर्श व यशस्वी भारतीय पुरुषा'चं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आहे असं म्हणण्यापेक्षा त्याच्या उतारवयातील उत्साहासारखा उत्साह आपल्यालाही लाभावा, असं वाटतं, हे जास्त खरं आहे.
कवी बा. भ. बोरकर यांच्या शब्दांत सांगायचं, तर 'जीवन त्यांना कळले हो' असं ज्यांच्याविषयी खात्रीनं म्हणता येईल, अशा या सगळ्या मोठमोठ्या व्यक्तिमत्त्वांच्या प्रभावाखाली जगताना, आपणही आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडवावं आणि भविष्यात कुणी तरी आपल्यावरही 'माझ्यावर श्रीपाद ब्रह्मे यांचा प्रभाव आहे,' असं लिहिण्याइतपत आयुष्यात काही तरी करून दाखवावं, एवढीच इच्छा आहे.
प्रभावाच्या प्रभावाखाली एवढी अपेक्षा ठीकच म्हणावी ना!

---

(पूर्वप्रसिद्धी : चिंतन आदेश दिवाळी अंक २०१९)
---

18 Nov 2019

चपराक दिवाळी अंक २०१९ - लेख

'रानडे'तले दिवस
---------------------



पुण्यातला फर्ग्युसन रस्ता म्हणजे तुरेवाला कोंबडाच. हा आरवल्याशिवाय गावात उजाडत नाही. आम्ही त्याला प्रेमानं एफसी रोड म्हणतो. (तसंही निम्मं वाक्य इंग्लिशमध्ये बोलल्याशिवाय या रस्त्याचं नागरिकत्व मिळत नाही.) अशा या महान रस्त्यावर रूपाली, वैशाली आणि तुलनेत नव्यानं झालेलं वाडेश्वर अशी तीन तीर्थक्षेत्रं (डेक्कनकडून आलं, की) उजव्या बाजूला आहेत. डाव्या बाजूची सगळी कसर आमच्या रानडे इन्स्टिट्यूटनं भरून काढलेली आहे. आधी पुणे शहर जगात भारी, त्यात फर्ग्युसन रस्ता पुण्यात भारी आणि त्यात हे चार धाम एफसी रोडवर भारी! अशा या चार धामांपैकी एक असलेल्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये मला शिकायला मिळालं हे माझं खरोखर भाग्य... पत्रकारितेतलं ते एक वर्ष म्हणजे आयुष्यातलं एक संस्मरणीय वर्ष होतं, यात शंका नाही.
बरोबर दोन दशकं उलटली. जुलै १९९९ मध्ये मी या संस्थेत प्रवेश घेतला. तेव्हा माझं सगळं उलटंच चालू होतं. अपयशी इंजिनीअरिंगनंतर मी १९९४ मध्ये अचानक नगरच्या 'लोकसत्ता'त प्रूफरीडर म्हणून काम करू लागलो होतो. नंतर सप्टेंबर १९९७ मध्ये पुण्यात 'सकाळ'मध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून रुजू झालो. सहा महिन्यांत उपसंपादक आणि दीड वर्षांत कायम झालो. उपसंपादक म्हणून जवळपास दोन वर्षं काम केल्यानंतर मी पत्रकारितेचे मूळ धडे गिरवायला निघालो होतो. माझ्यासोबतच 'सकाळ'मध्ये रुजू झालेला मंदार कुलकर्णीही होता. आम्ही तेव्हाचे संपादक विजय कुवळेकर सरांची परवानगी घेतली आणि बी. सी. जे.चा अर्ज भरला. तेव्हा हा एकच वर्षाचा कोर्स होता आणि त्याला बी. सी. जे. (बॅचलर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम) असं म्हणत. प्रवेशाची अट किमान पदवी ही होती. माझं सगळंच अर्धवट झाल्यानं मी नगरला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बी. ए. ला प्रवेश घेतला होता. पुण्यात नोकरी आणि वीकएंडला नगरला क्लासेस अशी कसरत चालू होती. पण फर्स्ट क्लासमध्ये बी. ए. झालो आणि बी. सी. जे. ला प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. तेव्हा या कोर्सच्या शेवटी दिल्लीला जी स्टडी टूर नेली जायची, त्याचं मला अत्यंत आकर्षण वाटत होतं. तोवर मी दिल्ली पाहिली नव्हती. या कोर्सच्या निमित्ताने दिल्लीदर्शन होईल, असा एक हेतू मनात होताच. तेव्हा मी आणि मंदारनं या कोर्सची प्रवेश परीक्षा दिली. आम्ही ऑलरेडी वृत्तपत्रांत काम करीत असल्यानं आम्हाला ती परीक्षा फारच सोपी गेली. वस्तुनिष्ठ प्रश्न वगैरे तर आम्ही किरकोळीत उडवले. त्यामुळं प्रवेशाच्या लिस्टमध्ये आमचं नाव आलं होतं. नंतरचा टप्पा हा मुलाखतीचा होता. तेव्हा अरुण साधू सर या विभागाचे प्रमुख होते. साधू सर, उज्ज्वला बर्वे मॅडम आणि अजून कुणी तरी एक पाहुणे अशा तिघांनी माझी मुलाखत घेतली. साधू सरांनी एवढंच विचारलं, की तुम्ही ऑलरेडी नोकरी करतच आहात, तर मग हा कोर्स कशाला करताय? मग त्यांना सांगितलं, की पत्रकारितेचं औपचारिक शिक्षण व पदवी हवी आहे. त्यानंतर आम्ही हा कोर्स मधेच सोडून जाऊ आणि त्यांची एक सीट वाया जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. अजिबात मधेच सोडून जाणार नाही, अशी हमी दिल्यावर माझा प्रवेश निश्चित झाला.
रानडे इन्स्टिट्यूटचा परिसर रम्य आहे. गुडलक चौक ओलांडला, की डाव्या बाजूला आर्यभूषण मुद्रणालयाची जुनी इमारत लागते. तिथं कोपऱ्यावरच नामदार गोपाळ कृष्ण गोखल्यांचा पुतळा आहे. त्यानंतर लगेच आमची रानडे इन्स्टिट्यूट. वास्तविक हा पुणे विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या व संज्ञापन विभाग. पण तो ज्या इमारतीत भरतो, तिथं पूर्वी रानडे इंडस्ट्रियल अँड इकॉनॉमिक इन्स्टिट्यूट होती. ती १९१० मध्ये स्थापन झाली होती. नंतर ती बंद पडली असावी. मात्र, १९६४ मध्ये याच इमारतीत पत्रकारिता अभ्यासक्रम सुरू झाला. नंतर समोर नव्या इमारतीत विद्यापीठाचा परकीय भाषा विभागही सुरू झाला. फर्ग्युसन रस्त्यावर मोक्याच्या जागेवर ही संस्था वसली असल्यानं वृत्तपत्रविद्या विभाग इथून दुसरीकडं जायला सगळ्यांचाच विरोध आहे. मी या ठिकाणी प्रवेश घेतला, तेव्हा म्हणजे १९९९ मध्ये फर्ग्युसन रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहतूक चालायची. मध्ये चांगला मोठा डिव्हायडर व त्यावर सोडियम व्हेपरचे लखलखीत दिवे होते. समोर 'वाडेश्वर'ही नव्हतं. तिथं छोटी छोटी दुकानं लागलेली असायची, असं आठवतंय. शेजारचं 'जोशी वडेवाले'ही नव्हतं. तिथं 'मयुरी' नावाचं एक छोटंसं रेस्टॉरंट होतं. त्याला एक पोटमाळा होता. लपून सिगारेट ओढण्यासाठी मुलांची (आणि मुलींचीही) ती फेव्हरिट जागा होती. ‘त्रिवेणी’ मात्र तेव्हाही होतं. तेव्हा तिथं आत बसायला दोन बाकडी होती. तिथं दाटीवाटीत बसून कित्येकदा मित्रांसोबत चहा-क्रीमरोल हाणले आहेत. अलीकडं झालेलं 'वेस्टसाइड'ही नव्हतं. तिथं एक छोटासा बंगला होता, असं आठवतंय. तोवर मी 'सकाळ'मध्ये सायकलच वापरत होतो. पुण्यात कुठंही रिपोर्टिंगला जायचं असेल, तरी सायकलवरूनच जायचो. तेव्हा सायकली बऱ्यापैकी वापरल्या जात होत्या. आमच्या ऑफिसात रीतसर भलंमोठं सायकल स्टँड होतं. जिथं रिपोर्टिंगला जायचो, त्या संस्थांमध्येही सायकल स्टँड असायचेच. मात्र, 'रानडे'त प्रवेश घेतल्यानंतर मला तिथं सायकलवर जायची लाज वाटायला लागली. नवी गाडी घेण्याची ऐपत नव्हती. सुदैवानं माझा जीवलग मित्र नीलेश नगरकर यानं तेव्हा नवी बाइक घेतली आणि त्याची 'एम-८०' मी विकत घेतली. आता मी त्या ग्रे कलरच्या 'एम-८०'वरून ऐटीत कॉलेजमध्ये येऊ लागलो.
लवकरच कॉलेज सुरू झालं आणि नवे मित्र-मैत्रिणी मिळाले. पुणे विद्यापीठाचा लौकिक मोठा असल्यानं इथं देशभरातून विद्यार्थी येत असतात. आमच्याही वर्गात दिल्ली, इंदूर इथून आलेल्या मुली होत्या. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेली मुलं होती. अशा वर्गात आपोआपच काही गट पडतात. मुलं आणि मुली हे तर अगदी ढोबळ गट झाले. पण ‘सिटी’तले आणि ‘बाहेरचे’ असे दोन गट पडले. ‘इंग्लिश मीडियमवाले’ आणि ‘मराठी मीडियमवाले’ असा एक गट पडला. (आम्हाला उत्तरपत्रिका मराठी किंवा इंग्लिशमधून लिहिण्याची मुभा होती. वर्षाच्या सुरुवातीलाच हा चॉइस सांगावा लागे. मी स्वाभाविकच मराठी निवडलं.) याशिवाय मराठी आणि अमराठी असाही एक गट पडला. जातीवरून गट पडल्याचं मला तरी आठवत नाही. तेव्हा ते वारं नसावं. (नंतर मात्र हे फार वेगानं वाढलं, असं निरीक्षण आहे.) आमच्या वर्गात मी, मंदार, सिद्धार्थ केळकर, संतोष देशपांडे, गणेश देवकर, गजेंद्र बडे, सुमित शहाणे, श्रीरंग गायकवाड, दीपक चव्हाण, विनोद पाटील, जय अभ्यंकर, अभियान हुमणे, अर्जुन भागचंद, मठपती आदी मुलं होती, तर जया जोस, कल्याणी चांदोरकर, गौरी कानेटकर, मानसी सराफ, उमा कर्वे, वैशाली भुते, अर्चना माळवे, वैशाली चिटणीस, प्रियंवदा कौशिक, प्रियांका डांगवाल, अस्मिता वैद्य, मीरा कौप, कस्तुरी डांगे, कल्पना पडघन, प्रिया कोठारी, सादिया समदानी, लिनेट थाइपरंबिल आदी मुली होत्या. यातले बहुसंख्य मित्र-मैत्रिणी आजही संपर्कात आहेत. (आमच्या वर्गाचा व्हॉट्सअप ग्रुपही तयार झालाय, हे सांगायला नकोच!) विशेष म्हणजे बरेच जण आजही पत्रकारितेत सक्रिय आहेत.
साधू सर आमचे एचओडी होते. त्यामुळं आम्ही अगदी भाग्यवान ठरलो. साधू सर नियमित लेक्चर घेत नसत; पण एखाद्या ऑफ तासाला वर्गात येत आणि त्यांचा मूड लागला, तर कुठल्याही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांवरचं खास ‘साधू शैली’तलं विवेचन आम्हाला ऐकायला मिळे. साधू सरांचा मित्रपरिवार व गोतावळा मोठा होता. त्यांच्यामुळं महाराष्ट्रातल्या बऱ्याच नामवंतांचे पाय आमच्या इन्स्टिट्यूटला लागत. कधी काही काम असेल, तर आम्ही त्यांच्या केबिनमध्ये जायचो. सर अनेकदा त्यांच्या आवडत्या ‘विल्स’चे झुरके घेत बसलेले असत. आम्हा विद्यार्थ्यांशी ते कायमच मैत्रीच्या नात्यानं वागले. आमच्या काही सहकाऱ्यांना तर ते सिगारेटही ऑफर करायचे म्हणे. (हे त्या सहकाऱ्यांनीच आम्हाला सांगितलं. साधू सरांना विचारायची हिंमतच नव्हती.) पण सरांचा मोकळा स्वभाव बघता हे शक्य होतं.
इतर विषयांना प्रा. उज्ज्वला बर्वे, प्रा. केवलकुमार, किरण ठाकूर सर, प्रा. प्रसन्नकुमार अकलूजकर सर, प्रा. जयदेव डोळे सर नियमित शिकवायचे. विठ्ठल माविनकुर्वे सर, श्रीकांत परांजपे सर, आशा चौधरी मॅडम, त्रिवेणी माथूर मॅडम वेगवेगळे विषय शिकवायला यायचे. अकलूजकर सरांचा मराठीचा तास सोडला, तर इतर सर्व विषय इंग्लिशमधून शिकवले जायचे. नंतरची चर्चा (आणि वाद-विवाद) बहुतांश मराठीतूनच चालायची. आम्ही सुरुवातीला मराठी मीडियमवाले दबकून असायचो. पण त्यातही मंदार व मी ऑलरेडी ‘सकाळ’मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत असल्यानं आम्ही उगाचच सीनिऑरिटी गाजवायचो. इतर मुलंही आम्हाला जरा दबकून वागायचे. नंतर आम्ही इंग्लिश मीडियम ग्रुपशी मैत्री केली. त्यातल्या कल्याणी, प्रियंवदा, उमा यांच्याशी चांगली मैत्री झाली व ती आजतागायत टिकून आहे. गौरी, मानसी, अर्चना या तर ‘मराठी’वाल्याच होत्या. कल्याणीनं आणि मी असं ठरवलं होतं, की मी तिच्याशी कायम इंग्लिशमध्ये बोलणार आणि ती माझ्याशी कायम मराठीतून बोलणार... ती मराठीच होती, त्यामुळं तिला काही प्रॉब्लेमच नव्हता. मी मात्र माझ्या मोडक्यातोडक्या इंग्लिशमध्ये तिच्याशी अफाट गप्पा मारायचो. पण ती कायम शांतपणे ऐकून घ्यायची. काही चुकलं तर सांगायची.
काही शिक्षक आपोआप लाडके होतात. उज्ज्वला बर्वे मॅडमचा तास आम्हाला सगळ्यांनाच आवडायचा. किरण ठाकूर सर गमतीजमतीत मस्त रिपोर्टिंग शिकवायचे. त्यांनी आम्हाला एक भन्नाट असाइनमेंट दिली होती. ती अजूनही लक्षात आहे. ‘रावणानं सीतेला पळवून नेलं,’ ही घटना आजच्या काळात घडली असती, तर तुम्ही तिची बातमी कशी लिहिली असती, अशी ती असाइनमेंट लिहिली होती. त्या वेळी माझ्या प्रतिभेला धुमारे फुटले आणि मी अगदी रंगवून ती बातमी लिहिल्याचं मला आठवतंय. तो कागदही बरीच वर्षं जपून ठेवला होता. बाहेर एखादा महत्त्वाचा कार्यक्रम किंवा समारंभ असेल, तर त्याचंही वार्तांकन करायला जावं लागायचं. पुणे विद्यापीठात तेव्हा म्हणजे जानेवारी २००० मध्ये सायन्स काँग्रेसचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा आमचं सगळं डिपार्टमेंट कामाला लागलं होतं. आम्ही ‘वृत्तविद्या’चा खास अंक तेव्हा काढला होता.
‘वृत्तविद्या’ म्हणजे आमच्या डिपार्टमेंटचा पेपर. हा टॅब्लॉइड, चार पानी किंवा आठ पानी पेपर दर महिन्यातून एकदा काढणं हा आमच्या अभ्यासक्रमाचा भाग होता. ‘वृत्तविद्या’साठी रीतसर टीम पाडल्या जायच्या. संपादक, वृत्तसंपादक नेमले जायचे. आमच्या टीमचा नंबर आला, तेव्हा विनोद पाटील संपादक झाला होता, असं मला आठवतंय. मी संतोष सिवनच्या ‘टेररिस्ट’ नावाच्या चित्रपटाचं परीक्षण लिहिलं होतं. (चित्रपट परीक्षणाची ही हौस तेव्हापासून... नंतर मी दीर्घकाळ माझ्या वृत्तपत्रासाठी हे काम करणार आहे, हे तेव्हा ठाऊक नव्हतं!) तेव्हा ‘बिनधास्त’ हा सिनेमा जोरदार चालू होता. मी तर त्या सिनेमाच्या प्रेमात पडलो होतो. वेळ मिळेल तेव्हा प्रभात चित्रपटगृहात जाऊन मी या सिनेमाला बसायचो. तब्बल १४ वेळा मी हा सिनेमा पाहिला, तोही दर वेळी वेगळ्या व्यक्तीला सोबत घेऊन! या रहस्यप्रधान चित्रपटातील ‘खून कोणी केला?’ हे रहस्य शेवटी उलगडतं. सोबत नेलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर ते रहस्य उलगडतानाचं आश्चर्य पाहत बसायला मला आवडे. ‘प्रभात’मध्ये एवढ्या वेळेला जाऊन तिथले मेहेंदळे काका, भिडेकाका, वाघकाका ही सगळी मंडळी ओळखीची झाली. नंतर आम्हाला एका वेगळ्या व्यवसायातील माणसाची मुलाखत घेऊन या, अशी असाइनमेंट देण्यात आली, तेव्हा मी डोअरकीपरचं काम अनेक वर्षं करणाऱ्या मेहेंदळेकाकांचीच मुलाखत घेतली. ‘प्रभातनगरीचा द्वारपाल’ असं शीर्षक त्या मुलाखतीला दिल्याचं मला अजून आठवतं. ‘बिनधास्त’ गर्ल शर्वरी जमेनीस हिची पहिली मुलाखतही मी या ‘वृत्तविद्या’साठी घेतली. ‘सकाळ’मध्ये कामाला असल्यानं त्यांच्या घरची दारं माझ्यासाठी उघडली. शर्वरीशी मस्त गप्पा झाल्या. मुलाखत छापली. “बिनधास्त’ अभिनय अन् अथक कथक’ असं त्या मुलाखतीचं शीर्षक होतं. ‘वृत्तविद्या’चा अंक काढणं हा खूप धमाल अनुभव असे. या कामासाठी रात्री उशिरापर्यंत डिपार्टमेंटमध्ये थांबण्याची परवानगी असे. मग बाहेरच सगळ्यांनी मिळून काही तरी भेळ वगैरे अबरचबर खाणं, सतत चहा-सिगारेटी असं सगळं चाललेलं असायचं. आपला अंक इतरांपेक्षा चांगला व्हावा, अशी धडपड चालायची. ताज्यातली ताजी बातमी घ्यायचा हट्ट असायचा. तेव्हा ‘गुगल’ नुकतंच सुरू झालं होतं. सकाळची ‘ई-सकाळ’ही वेबसाइटही नुकतीच सुरू झाली होती. डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये बहुतेक एकच इंटरनेट कनेक्शन होतं आणि त्याचा स्पीड अतिमंद होता. फोटो डाउनलोड करणे हा काही तासांचा कार्यक्रम असायचा. आमचे नेर्लेकर सर या कामात सगळ्यांना मदत करायचे. भोपळ‌े बाई कायम मदतीला तत्पर असायच्या. शिंदे म्हणून शिपाई होते, (मला वाटतं, प्रसिद्ध बाबू टांगेवाले यांचे ते चिरंजीव होते...) तेही कायम हसतमुखानं मदत करायचे.
या डिपार्टमेंटमध्ये मागच्या बाजूला एका पत्र्याच्या शेडमध्ये कँटीन होतं. हे रमेशचं कँटीन. या डिपार्टमेंटच्या मांडवाखालून गेलेल्या तमाम पत्रकारांच्या भावविश्वातला आजही हळवा कोपरा असलेलं हे कँटीन! तिथं किती चहा घेतले, किती वडा-पाव, किती समोसे, किती ब्रेड-पॅटिस आणि किती पोहे खाल्ले याची गणतीच नाही. किती तरी आनंदाच्या प्रसंगी इथंच खिदळलो. मित्र-मैत्रिणींसोबत दंगा केला. कधी दु:खी झालो, कधी रडलो... ते सगळं या कँटीनच्या साक्षीनंच! (नंतर डिपार्टमेंटमधे शिकवायला जायची, पेपर तपासायला जायची संधी मिळाली, तेव्हाही याच कँटीनची साथ होती.) खरं तर या कँटीनवर वेगळा लेख होऊ शकतो. एवढ्या तिथल्या आठवणी आहेत!
मुळात आमचं शैक्षणिक वर्ष मोठं विलक्षण होतं. १९९९-२००० असं आमचं हे बी. सी. जे. चं वर्ष होतं. एक शतक कूस बदलताना आम्ही पाहत होतो. देशात तीन वर्षं राजकीय अस्थैर्य आणि अशांततेत गेल्यानंतर वाजपेयींचं पूर्ण बहुमताचं सरकार अखेर स्थापन झालं होतं. सचिन तेंडुलकरची महान खेळाडू होण्याकडं दमदार वाटचाल सुरू होती. सुभाष घईंच्या ‘ताल’च्या गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. शतक बदलताना जगभराच्या संगणकांना वर्ष बदलण्याचा मोठा सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम येणार होता आणि तो सोडवू शकणाऱ्या भारतीय इंजीनीअर्सना जगभरातून मागणी येत होती. ‘वायटूके’ नावानं ओळखल्या जाणाऱ्या या प्रॉब्लेममुळं भारतात ‘डॉट कॉम’ कंपन्यांचं पेव फुटलं होतं. मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात अचानक वाढ झाली होती. आमचं शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आसपास ‘कारगिल’चं युद्ध झालं होतं आणि पुढचा काळ काही भारत-पाकिस्तान संबंधांत विलक्षण तणाव निर्माण झाला होता. बाळासाहेब ठाकरे साहित्यिकांना ‘बैल’ म्हणत होते आणि मनोहर जोशींना काढून नारायण राणेंना मुख्यमंत्रिपदावर बसवत होते. त्याच वर्षात त्यांची सत्ता गेली आणि विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. छगन भुजबळांना उपमुख्यमंत्रिपद मिळालं. आम्ही हे सगळे बदल बघत होतो. ऑफिसात त्याच्या बातम्या लिहीत होतो आणि ‘रानडेत’ वर्गात येऊन परत त्यावर वेगळी चर्चा करीत होतो. रात्री उशिरा ‘मंडई विद्यापीठा’त ज्येष्ठ पत्रकारांसोबत रंगणारी मैफल आम्हाला नवनवे गॉसिप पुरवायची. ती दुसऱ्या दिवशी वर्गात शायनिंग मारायला उपयोगी पडायची. तेव्हा ऑफिसव्यतिरिक्त इतर अनेक कार्यक्रमांना, मुलाखतींना, महोत्सवांना, प्रदर्शनांना किंवा संमेलनांना जाऊन बसायची आम्हाला फार हौस होती. मी आणि मंदार, मी आणि संतोष असे आम्ही किती तरी कार्यक्रम एकत्र पाहिले, अनुभवले. कुठल्याही गोष्टीचा मुळी कंटाळा यायचाच नाही. कितीही काम असू दे किंवा कितीही अभ्यास असू दे! मुळात तेव्हा सगळे बॅचलर होतो आणि स्वत: कमावत होतो. सगळ्या गोष्टी आपल्या चॉइसनं करण्याची ती गंमत होती. सगळी मज्जाच!
‘वृत्तविद्या’चे अंक अशा विलक्षण धुंदीतच आम्ही काढले. सायन्स काँग्रेस संपली आणि फेब्रुवारीत आम्हाला गॅदरिंगचे वेध लागले. तेव्हा मराठी आणि इंग्लिश असे दोन डिप्लोमाही सकाळीच्या वेळी चालत. मराठी डिप्लोमाला आमचे काही मित्र-मैत्रिणी होते. तीन विभागांचं एकत्रित स्नेहसंमेलन म्हणून ‘त्रिवेणी’ असं नाव या गॅदरिंगला होतं. मी या गॅदरिंगमध्ये ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ सादर केलं. मंदारनं ‘हसवाफसवी’मधले ‘कृष्णराव हेरंबकर’ सादर केले. मी त्याची मुलाखत घेतली. संतोष देशपांडेनं डोनाल्ड डकचे अप्रतिम आवाज काढले. डिप्लोमाच्या माधवी कुलकर्णीनं म्हटलेलं ‘त्याची धून झंकारली रोमारोमांत’ अजूनही लक्षात आहे. गॅदरिंगची धमाल संपली आणि आम्हाला वेध लागले ते दिल्ली ट्रिपचे...
मार्चमध्ये आम्ही दिल्लीला गेलो. स्वत: अरुण साधू सर आणि बर्वे मॅडम आमच्याबरोबर होत्या. गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसनं आम्ही जाणार होतो. ती गाडी पहाटे चार वाजता पुण्यात येते. आम्ही सगळे रात्री बारा वाजताच स्टेशनला पोचलो. गाडी वेळेत आली. रात्रभर जागूनही कुणालाच कंटाळा आलेला नव्हता. आम्ही अखंड बडबडत होतो. आम्हा मुलांची रिझर्व्हेशन्स जनरल स्लिपर डब्यात होती, तर साधू सर एसी डब्यात होते. प्रसिद्ध पत्रकार प्रफुल्ल बिडवई हेही त्यांच्यासोबत होते, असं आठवतंय. संतोष, मी, सिद्धार्थ आणि मंदार अशी आमची चौकडी जमली होती. गणेश, रंगा हेही दंगा करायला सोबत असायचेच सतत! मला आदल्या दिवाळीत माझ्या थोरल्या मेव्हण्यांनी ‘सोनी’चा वॉकमन भेट दिला होता. तो मोबाइलपूर्व काळ असल्यानं हा वॉकमन मला अत्यंत प्रिय होता. मी त्याचे भरपूर सेल सोबत घेऊन ठेवले होते. तेव्हा रेल्वे प्लॅटफॉर्मवर सिगारेट विकायला नुकतीच बंदी आली होती. आमच्यापैकी अनेकांची त्यामुळं गैरसोय होणार होती. मात्र, मुलांनी सिगारेटची पाकिटं सोबत आणली होती. त्यामुळं मुलं आणि सिगारेट ओढणाऱ्या काही मुली असे सगळेच खूश झाले. मग रेल्वेतल्या टॉयलेटजवळच्या जागेत जाऊन दोघं-दोघं, तिघं-तिघं सिगारेट ओढून यायचो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भोपाळच्या अलीकडं बुधनीच्या घाटात रेल्वे आली तेव्हा मी ‘ताल’ची कॅसेट ऐकत उभा राहिलो. ‘रमता जोगी’ हे गाणं, हलती रेल्वेगाडी आणि समोरचा सूर्यास्त हे दृश्य माझ्या स्मरणात कायमचं कोरलं गेलंय. (पुढे दोन-तीन वर्षांत अजून दोनदा याच मार्गानं दिल्लीला जाण्याची संधी मिळाली, तेव्हा मी या घाटात आलो की ‘ताल’ची कॅसेट काढून ऐकायचो.) तिसऱ्या दिवशी पहाटे आम्ही निजामुद्दीनला पोचलो. तोवर मला निजामुद्दीन हे एका स्टेशनचं नाव आहे हेही ठाऊक नव्हतं. निजामुद्दीनच्या आधी ओखला स्टेशन लागतं. मी पहाटेच गाडीच्या दरवाजावर येऊन बाहेर बघत होतो. तिथली जाणवणारी थंडी, शेजारी मोठमोठ्या कारखान्यांची धुराडी, तिथल्या हायमास्ट सोडियम व्हेपरच्या पिवळ्या दिव्यांचा झगमगाट आणि मला आधी ‘कोहरा’ वाटलेली, पण प्रत्यक्षात दिल्लीतली अतिशय प्रदूषित असलेली हवा आणि त्यामुळं दिसणारा धुरकट आसमंत... हे दृश्य आजही डोळ्यांसमोर आहे.
आमची राहण्याची सोय नवी दिल्लीतील चाणक्यपुरीमधील यूथ होस्टेलमध्ये करण्यात आली होती. नवी दिल्ली मला प्रथमदर्शनीच आवडली. दिल्लीतले पुढचे आमचे पाच-सहा दिवस अगदी स्वप्नवत होते. कॉलेजमधले माझे दिवस मला फारसे काही नीट एंजॉय करता आले नव्हते. ती सगळी कसर इथं भरून निघाली. दिल्लीत आम्ही तेव्हाचे उपपंतप्रधान व गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना नॉर्थ ब्लॉकमधल्या कार्यालयात भेटलो. साधू सर सोबत असल्याने सत्तेचे सगळे दरवाजे आमच्यासाठी सहज उघडले जात होते. अडवाणींनी आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. ‘ही ल्युटन्स दिल्ली कधी स्थापन झाली,’ असा प्रश्न त्यांनी विचारला होता. मी नुकतंच वाचलेलं असल्यानं मी १९२९ असं उत्तर दिलं. पुण्यात परराज्यांतले अनेक विद्यार्थी शिकायला येतात; तुमच्यापैकी किती जण परराज्यांतील आहेत, असंही त्यांनी विचारलं. जिलेबी, ढोकळा वगैरे पदार्थ समोर होते. चहा झाला. एकूण ही भेट संस्मरणीय होती. नंतर शास्त्री भवनला पीआयबीचं ऑफिस बघितलं आणि  तिथंच तत्कालीन पेट्रोलियममंत्री राम नाईक यांनाही आम्ही भेटलो. नाईकांनीही आम्हाला चांगला वेळ दिला आणि गप्पा मारल्या. नंतर एकेका दिवशी आम्ही तत्कालीन अवजड उद्योग मंत्री मनोहर जोशी, तत्कालीन लोकसभा अध्यक्ष पी. ए. संगमा यांनाही भेटलो. ‘बीबीसी’चे प्रसिद्ध वार्ताहर मार्क टुली यांनाही निजामुद्दीन परिसरातील त्यांच्या घरी जाऊन भेटलो. टुली यांनी अस्खलित हिंदीतून आमच्याशी गप्पा मारल्या. संगमा यांच्या घरीही खूप मजा आली. जोशींचा बंगला मोठा होता. सकाळी त्यांच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या लॉनवर बसून आम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. नंतर आम्ही एनडीटीव्हीच्या ‘ग्रेटर कैलाश’मधील ऑफिसमध्ये गेलो. तिथं राजदीप सरदेसाई भेटले. ‘मी या क्षेत्रात जास्तीत जास्त अजून पाच वर्षं राहीन,’ असं ते आम्हाला तेव्हा म्हणाले होते. या खासगी वृत्तवाहिन्यांना तेव्हा भारतातून अपलिंकिंगची परवानगी नव्हती. तेव्हा सिंगापूर की हाँगकाँगवरून एनडीटीव्हीचं अपलिंकिंग व्हायचं. त्याला पाच मिनिटं वेळ लागायचा. त्यामुळं तिथली स्टुडिओतली सगळी घड्याळं पाच मिनिटं पुढं लावलेली होती, हे बघून आश्चर्य वाटलं. नंतर आम्ही ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ऑफिसातही गेलो. मात्र, ‘आकाशवाणी’तली भेट मला विशेष आवडली. ‘दिल्ली आकाशवाणी’ची गोलाकार इमारत छान आहे. तिथं आम्हाला प्रत्यक्ष बातम्या प्रक्षेपित होताना पाहता आल्या. ‘बोरून हलदार’ हे नाव अनेक वर्षं ऐकून माहिती होतं. ते त्या दिवशी बातम्या द्यायला होते. आम्ही काचेपलीकडून ब्रॉडकास्ट बघत होतो. समोरचा दिवा लागला आणि ‘धिस इज ऑल इंडिया रेडिओ. द न्यूज, रेड बाय बोरून हलदार’ असे खर्जातले, चिरपरिचित शब्द कानावर पडल्यावर थरारून जायला झालं.  बातम्या देऊन ते बाहेर आले, तेव्हा मी त्यांना सहज विचारलं, ‘आम्ही खूप लहानपणापासून तुमचा आवाज ऐकतो आहोत. तुम्ही किती वर्षं हे काम करताय?’ त्यावर, ‘आय अॅम वर्किंग हिअर फॉर लास्ट हंड्रेड अँड फिफ्टी इयर्स’ असं म्हणून गडगडाटी हसत ते निघून गेले.
नंतर समोरच असलेल्या ‘पीटीआय’च्या ऑफिसलाही आम्ही भेट दिली. ‘यूएनआय’चं कँटीन फेमस आहे. तिथं जाऊन इडली, ‘सुजी हलवा’ आदी पदार्थ खाल्ल्याचं आठवतंय. याच वेळी मी आणि सिद्धार्थ साधू सरांसोबत जॉर्ज फर्नांडिसांना भेटायला त्यांच्या कृष्ण मेनन मार्गावर असलेल्या बंगल्यात गेलो. फर्नांडिस तेव्हा संरक्षणमंत्री होते. आम्ही आत गेलो आणि त्यांची अँबेसिडर समोरूनच आली. फर्नांडिस समोरच ड्रायव्हरच्या शेजारी बसले होते. काच खाली करून ते साधूंशी बोलले. साधूंच्या ‘मुंबई दिनांक’मधलं डिकास्टा हे पात्र जॉर्ज यांच्यावरच बेतलेलं आहे, असं ऐकलं होतं. इथं लेखक व ‘डिकास्टा’ यांना साक्षात भेटताना आम्ही बघत होतो. फर्नांडिस यांनी आम्हाला नंतरची एक वेळ दिली; मात्र तेव्हा ती भेट झालीच नाही.
प्रमुख भेटी-गाठी संपल्यावर आम्ही एक दिवस दिल्लीतील ‘स्थलदर्शन’ केलं. कुतुबमिनार, लोटस टेंपल, हुमायून कबर आदी ठिकाणी फिरलो. नंतर आम्ही एक वेगळी बस करून आग्र्यालाही गेलो. ताजमहाल बघून आलो. रोज संध्याकाळी दिल्लीत भटकंती आणि तिथलं खाणं-पिणं असं भरपूर एंजॉय केलं. ‘मशिन का ठंडा पानी’ बघून मजा वाटायची. तिथल्या फेमस पालिकाबाजारमध्ये शॉपिंग केलं. आईला साडी आणि दोन्ही बहिणींना ड्रेस घेतल्याचं आठवतंय. तेव्हा दिल्लीत मेट्रो यायची होती. अक्षरधाम मंदिरही बहुतेक व्हायचं होतं. अखेर आठवडाभरानं त्याच ‘निजामुद्दीन-गोवा एक्स्प्रेस’नं पुण्याला परतलो.
परतल्यानंतर बर्वे मॅडमनी आम्हाला दिल्ली ट्रिपचा वृत्तांत लिहिण्याची असाइनमेंट दिली. मी ती जरा ललित शैलीत, हलक्याफुलक्या भाषेत लिहिली. ती त्यांनाही आवडली. मी असं लिहू शकतो, याचा विश्वास त्यांना वाटला. ही असाइनमेंटही मी बरेच दिवस जपून ठेवली होती.
दिल्ली ट्रिपवरून परतलो आणि पुण्यात कडक उन्हाळा सुरू झाला. अभ्यासाचे दिवस सुरू झाले. राहिलेल्या असाइनमेंट पूर्ण करण्याची घाई-गडबड सुरू झाली. कमी हजेरी भरलेली मुलं साधू सरांकडं चकरा मारू लागली. डिपार्टमेंटचं वातावरणच बदललं. रमेशच्या कँटीनमध्ये पडीक असलेली पोरं पटापटा घर, होस्टेल, रूम गाठू लागली. कधी नाही ते चार पुस्तकं उघडून वाचू लागली. मी आणि संतोष देशपांडे बऱ्याचदा एकत्र अभ्यास करायचो. तेव्हा संतोषचं प्रेमप्रकरण सुरू होतं. (वर्गात नव्हे!) मधूनच तो त्याच्या कविता ऐकवायचा. मे महिन्यात आमची परीक्षा होती. मॉडर्न कॉलेजमध्ये आमचे नंबर आले होते. मी आणि संतोष बरोबरच पेपरला जायचो. जाताना डेक्कनला ‘अपना घर’मध्ये साबुदाणा खिचडी आणि तिथलं मधुर ताक पिऊन आम्ही पुढं जायचो. एकाही पेपरला हा क्रम चुकला नाही. परीक्षा संपल्या आणि डिपार्टमेंटमधलं आमचं वर्षही संपलं... दोन-तीन महिन्यांनी निकाल लागला. मला फर्स्ट क्लास मिळाला होता. हा कोर्स केल्याचं सार्थक झालं. मार्कांपेक्षाही वर्षभर तिथं जे शिकायला मिळालं, ती शिदोरी अजूनही पुरते आहे. नंतरही डिपार्टमेंटशी संबंध राहिलाच. पेपर तपासायला जाण्याच्या निमित्तानं डिपार्टमेंटला पाय लागत राहिले. नंतर तिथं तीन वर्षं शिकवायचीही संधी मिळाली. जिथं आपण शिकलो, त्याच वर्गात शिकवायला मिळणं यापेक्षा अधिक भाग्य ते कुठलं!
नंतर मी ‘मटा’त आलो आणि डिपार्टमेंट हाकेच्या अंतरावर आलं. अगदी संध्याकाळच्या चहालाही रमेशच्या कँटीनला जाऊ लागलो. व्हॉट्सअप सुरू झाल्यानंतर पुन्हा सगळे मित्र एकत्र आले. ग्रुप तयार झाला. सगळ्यांची ख्यालीखुशाली कळू लागली. बहुतेक जण पत्रकारितेत सक्रिय आणि आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. छान वाटतं! आता वीस वर्षांत भरपूर गोष्टी बदलल्या आहेत. काही चांगलं घडलंय, तर काही वाईट! पण बदल होत राहणारच. आज मागे वळून पाहिलं, तर लक्षात येतं, की डिपार्टमेंटनं आपल्याला काय दिलं? विद्यार्थिवृत्ती कायम ठेवण्याची दीक्षा दिली, मोठमोठ्या लोकांकडून शिकण्याची संधी दिली, सदैव पाय जमिनीवर ठेवण्याची शिकवण दिली आणि भरपूर मित्रपरिवार दिला. या सर्व गोष्टींसाठी मी ‘रानडे’तल्या त्या सुंदर दिवसांशी कायम कृतज्ञ राहीन!

---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्य चपराक दिवाळी अंक २०१९)

---