27 Feb 2025

क्रिककथा दिवाळी अंक २४

सिनेमातलं क्रिकेट
----------------------


भारतीय लोकांना क्रिकेट, सिनेमा आणि क्राइम या तीन ‘सीं’विषयी अतोनात आकर्षण आहे. या तिन्ही विषयांत बोलायला कुणालाही कसल्याही पात्रतेची गरज नसते. या देशातील प्रत्येक नागरिक अगदी मुक्तपणे या तिन्ही विषयांत आपलं मत व्यक्त करत असतो. त्यातल्या त्यात क्राइम या विषयात सर्वसामान्यांना गप्पांव्यतिरिक्त फार काही करता येण्यासारखं नसल्यानं इतर दोन विषयांना फूटेज अधिक मिळतं, हेही खरं. क्रिकेट आणि सिनेमा ही दोन्ही आपल्याकडची ग्लॅमरस क्षेत्रं. दोन्ही अमाप लोकप्रिय. दोन्ही क्षेत्रांतील माणसांना मोठं वलय. त्यात यश मिळवणाऱ्यांचं अफाट कौतुक होतं. त्यांच्याविषयी एक सुप्त आकर्षण आणि आपुलकीही वाटते. मोठे ‘स्टार’ त्यातूनच जन्माला येतात. क्रिकेट आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रांतील मंडळी एकमेकांच्या क्षेत्रांत जात-येत असतात. सिनेमातल्या मंडळींना क्रिकेटमध्ये थेट खेळायला जाणं कठीण, तसंच क्रिकेटपटूंना थेट कॅमेऱ्यासमोर उभं राहून अभिनय करणं कठीण. मात्र, त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा त्या त्या वेळी घेण्यासाठी हे सर्व प्रकार सर्रास केले जातात. क्रिकेटपटू आणि अभिनेत्री यांचे विवाह किंवा अफेअर यांचीही आपल्याकडे चवीचवीनं चर्चा चालत असते. गॅरी सोबर्स-अंजू महेंद्रू, टायगर पतौडी-शर्मिला टागोर, व्हिव रिचर्ड्स-नीना गुप्ता, रवी शास्त्री-अमृतासिंग, मोहसीन खान-रीना रॉय, वासीम अक्रम-सुश्मिता सेन, विराट कोहली-अनुष्का शर्मा, हरभजनसिंग-गीता बसरा ही त्यातली काही गाजलेली उदाहरणं. क्रिकेटपटूंनी सिनेमात काम करणं हेही आपल्याकडं नवीन नाही. सुनील गावसकर (प्रेमाची सावली), संदीप पाटील (कभी अजनबी थे), अजय जडेजा (खेल) ही उदाहरणं प्रसिद्ध आहेत. गावसकरने मराठीत दोन गाणीही म्हटली आहेत. ऐंशीच्या दशकात सुनीलनं गायलेलं ‘हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा…’ हे गाणं ‘आकाशवणी’वर सतत लागायचं. अलीकडं खूप वर्षांनी मी ते यू-ट्यूबवर ऐकलं, तेव्हा एकदम लहान झाल्यासारखं वाटलं.
क्रिकेट आणि सिनेमाचं हे असं नातं असल्यानं क्रिकेट रूपेरी पडद्यावर या ना त्या रूपात अवतरणार, यात काही आश्चर्य नाही. क्रिकेटवर आधारित अनेक चित्रपट आले. यात प्रामुख्याने दोन प्रकार दिसतात. एक पूर्ण काल्पनिक कथानकावर आधारित, तर दुसरे क्रिकेटपटूंचे बायोपिक. पहिल्या प्रकारात ‘इक्बाल’, ‘फेरारी की सवारी’ किंवा ‘लव्ह मॅरेज’सारखे सिनेमे येतात, तर दुसऱ्यात ‘८३’, ‘अजहर’, ‘एम. एस. धोनी’, ‘शाबाश मिथू’ असे सिनेमे येतात. याशिवाय ‘सचिन- ए बिलियन ड्रीम्स’सारखा डॉक्यु-सिनेमा या दुर्मीळ प्रकारातला ‘सिनेमा’ही आला आहे. क्रिकेटवर माहितीपट तर विपुल आहेत. आता विविध ओटीटी प्लॅटफॉर्ममुळं अनेक माहितीपट पाहायला मिळतात. त्यात क्रिकेटवर भरपूर माहितीपट उपलब्ध आहेत. मात्र, मला आठवते ते नव्वदच्या दशकात ‘दूरदर्शन’वरून प्रसारित झालेली ‘बॉडीलाइन’ ही प्रसिद्ध मालिका. इंग्लंड-ऑस्ट्रेलियातील त्या कुप्रसिद्ध मालिकेवर आधारित ही टीव्हीमालिका खरोखर खिळवून ठेवणारी झाली होती. डॉन ब्रॅडमन, डग्लस जार्डिन, हेराल्ड लारवूड ही नावं तोवर नुसती ऐकली होती किंवा वाचली होती. या मालिकेच्या रूपानं (त्यांच्या पात्रांच्या रूपानं का होईना) तेव्हाचं नाट्य पडद्यावर प्रत्यक्ष अनुभवता आलं होतं. अलीकडं आलेली ‘इनसाइड एज’ ही आयपीएलसारख्या स्पर्धांवर आधारित मालिकाही गाजली होती. अर्थात इथे आपल्याला प्रामुख्याने ‘क्रिकेटचा समावेश असलेले चित्रपट’ याच वर्गवारीचा अधिक विचार करायचा आहे.
त्या दृष्टीने विचार केल्यास वरील दोन्ही प्रकारांतला सर्वोत्कृष्ट किंवा आतापर्यंतचा सर्वांत यशस्वी हिंदी चित्रपट आहे तो ‘लगान’. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ २००१ मध्ये प्रदर्शित झाला. क्रिकेट सामन्याची मध्यवर्ती कल्पना घेऊन आशुतोषने तीन तासांचं हे भव्य नाट्य रूपेरी पडद्यावर अतिशय तळमळीनं सादर केलं होतं. आमीर खानच्या करिअरला वेगळं वळण देणारा असा हा सिनेमा होता. ब्रिटिशांच्या सत्ताकाळात एकोणिसाव्या शतकात चंपानेर या मध्य भारतातील एका काल्पनिक संस्थानात घडणारी ही गोष्ट होती. दुष्काळामुळं शेतकऱ्यांना सारा (लगान) देता येत नाही. तेव्हा तो वसूल करण्यासाठी त्या प्रांतातील आढ्यतेखोर अधिकारी कर्नल रसेल गावकऱ्यांसमोर क्रिकेट सामना खेळण्याचा प्रस्ताव ठेवतो. ‘लगान’ रद्द करून घ्यायचा असेल तर अर्थात या सामन्यात इंग्रजांच्या टीमला हरवावं लागेल, ही मुख्य अट असते. गावकऱ्यांच्या वतीनं भुवन (आमीर) हे आव्हान स्वीकारतो आणि कधीही न खेळलेल्या त्या चेंडू-फळी नावाच्या ‘विचित्र’ खेळाचा अभ्यास सुरू करतो. या कामी त्याच्या मदतीला येते कर्नल रसेलची बहीण. हिचं मनोमन भुवनवर प्रेम बसतं. भुवन त्या दुष्काळी प्रांतातील नानाविध प्रकारच्या लोकांना एकत्र करून अक्षरश: एकहाती संघबांधणी करतो. त्यानंतर प्रत्यक्ष सामना रंगतो, त्यात येणाऱ्या अडचणी, भोळ्याभाबड्या गावकऱ्यांचं या खेळाविषयीचं आधी अज्ञान, मग कुतूहल आणि मग जिंकणारी ईर्षा, भुवनची प्रेमकहाणी, कॅप्टन रसेलचे राजकारणी डावपेच… या सगळ्याला देशभक्तीचा जोरदार तडका आणि ए. आर. रेहमानची जबरदस्त गाणी असा सगळा योग जुळून आल्यानं ‘लगान’ सुपरडुपर हिट झाला.


आशुतोष गोवारीकरच्या डोक्यात अनेक वर्षं हे कथाबीज घोळत होतं. त्याला हवा तसा सिनेमा तयार करायला बराच खर्च येणार होता. तो खर्च करायला तयार असणारा निर्माता त्याला मिळत नव्हता. मात्र, आमीर खानला या कथेत ‘स्पार्क’ आढळला. आमीरचा हा अंदाज किती योग्य होता, हे भविष्यात सिद्ध झालंच. आशुतोषनं अतिशय तब्येतीनं, वेळ घेत हा सिनेमा तयार केला. या सिनेमासाठी गुजरातमध्ये भुजजवळ एक गावच वसवण्यात आलं होतं. ‘मेकिंग ऑफ लगान’ नावाच्या माहितीपटात हा सर्व प्रवास तपशीलवार दाखवण्यात आला आहे. अनेक बाबतींत ‘लगान’ हा ‘शोले’सारखा होता. दोन्ही चित्रपटांना लाभलेल्या प्रचंड यशात काही साम्यस्थळं होती. अतिशय बंदिस्त पटकथा, प्रत्येक व्यक्तिरेखा लक्षात राहील अशा पद्धतीनं केलेलं काम, मुख्य भूमिकेत लोकप्रिय अभिनेता आणि उतम संगीत. याशिवाय ‘लगान’च्या पारड्यात अजून एक गोष्ट होती, ती म्हणजे क्रिकेट. या सिनेमाच्या केंद्रस्थानी क्रिकेट होतं. भारत अनेक वर्षांपासून क्रिकेट खेळत असला तरी आपल्या देशात अगदी तळागाळापर्यंत क्रिकेटचं वेड आणि प्रत्यक्ष तो खेळण्याची मुलांमधली आस ही साधारण १९८३ मध्ये आपण इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रुजली असं म्हटल्यास वावगं ठरू नये. यानंतर पुढचीच वर्ल्ड कप स्पर्धा १९८७ मध्ये भारतातच भरली. यामुळं क्रिकेटची लोकप्रियता आणखी वाढली. याच वर्षी सुनील गावसकर निवृत्त झाला, पण दोनच वर्षांनी भारताला सचिन तेंडुलकर नावाचा सुपरस्टार मिळाला. यानंतर भारतानं १९९१ मध्ये आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारल्यानंतर भारतात खासगी वाहिन्या दिसू लागल्या. ‘स्टार टीव्ही’चं उच्च दर्जाचं प्रक्षेपण भारतातही दिसू लागलं. जाहिराती वाढल्या. भारतीय क्रिकेट मंडळ पैशांनी श्रीमंत होऊ लागलं. मग १९९६ चा वर्ल्ड कप पुन्हा भारतात (पाकिस्तान व श्रीलंकेसोबत संयुक्त यजमान) भरला. क्रिकेटच्या छोट्याशा जगावर भारताचं साम्राज्य मैदानावर नसलं, तरी आर्थिकदृष्ट्या जाणवू लागलं होतं. याच काळात शतकानं कूस बदलली. सिनेमाही बदलला. भारतात मल्टिप्लेस संस्कृतीचं आगमन झालं. ‘दिल चाहता है’ हा या नव्या तरुणाईच्या मानसिकतेचा वेध घेणारा फ्रेश चित्रपट याच काळात आला. सुभाष घईंपासून ते फरहान अख्तरकडे असा हा प्रवास सुरू झाला होता. चित्रपटांत वेगवेगळे प्रयोग व्हायला लागले होते. याच काळात ‘लगान’ आला. मल्टिप्लेक्सचं आगमन झालं असलं, तरी देशभर अद्याप सिंगल स्क्रीन थिएटरचंच प्राबल्य होतं. त्यामुळं तब्बल सव्वातीन तासांचा हा सिनेमा बघणं तेव्हा प्रेक्षकांना जड गेलं नाही. सिनेमाही अर्थात खिळवून ठेवणाराच झाला होता. भारतीय क्रिकेटही बदलत होतं. सचिन, गांगुली, सेहवाग, लक्ष्मण, द्रविड, कुंबळे, झहीर यांच्या संघात आता विजिगिषू वृत्ती दिसत होती. भुवनच्या संघानं तेव्हाच्या राज्यकर्त्या इंग्लंडच्या संघाला हरवणं हे फारच प्रतीकात्मक आणि अपील होणारं होतं. आशुतोषनं सिनेमातील संघात घेतलेले एकेक खेळाडूही भारतातील सर्व धर्म, प्रांत यांचं नेमकं प्रतिनिधित्व करत होते. अगदी ‘अछूत कचरा’ हे पात्र आणून आशुतोषनं त्याला यातून कोणता संदेश द्यायचा आहे हे बरोबर अधोरेखित केलं होतं. ‘लगान’ भारतीयांना मनापासून आवडेल अशी डिश होती. ती तुफान लोकप्रिय होणार होती, याची बीजं तिच्या कथासूत्रात आणि क्रिकेटसारख्या मध्यवर्ती संकल्पनेचा नेमका वापर करण्यात दडली होती. आजही क्रिकेट या विषयावरचा फिक्शन गटातला सर्वोत्तम चित्रपट म्हणून ‘लगान’चं स्थान अढळ आहे.

‘लगान’नंतर फिक्शन प्रकारात मोठी लोकप्रियता मिळविणारा चित्रपट म्हणून नागेश कुकनूरच्या ‘इक्बाल’चा उल्लेख करावा लागेल. सुभाष घईंची निर्मिती आणि नागेश कुकनूरचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना भावला. यातील ‘इक्बाल’ची भूमिका साकारणाऱ्या श्रेयस तळपदेला या चित्रपटामुळं देशव्यापी (खरं तर विश्वव्यापी) प्रसिद्धी मिळाली. यातील नसीरुद्दीन शाह यांची भूमिकाही उल्लेखनीय होती. इक्बालच्या बहिणीच्या भूमिकेत श्वेता प्रसादनं, आईच्या भूमिकेत प्रतीक्षा लोणकरनं, तर वडिलांच्या भूमिकेत यतीन कार्येकरनं चांगली छाप पाडली. ‘इक्बाल’मधलं ‘आशाएँ खिली दिल में…’ हे केकेनं गायलेलं गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. अगदी आजही ते तितकंच लोकप्रिय आहे. ‘इक्बाल’ ही एका मूकबधिर मुलाच्या स्वप्नांची प्रेरणादायी कहाणी होती. या मुलाला क्रिकेटचं वेड असतं. त्याला भारतासाठी क्रिकेट खेळायचं असतं. मात्र, मूकबधिर मुलाला कोण संघात घेणार? त्याचे वडील त्यामुळं त्याला विरोध करत असतात. मात्र, त्याची धाकटी बहीण त्याला कायम प्रोत्साहन देत असते. अखेर ती मोहित (नसीरुद्दीन) नावाच्या एका मद्यपी क्रिकेटरला भेटते आणि इक्बालला प्रशिक्षण देण्याची विनंती करते. हा मोहित एके काळचा चांगला क्रिकेटर असतो. तो मग इक्बालला कसं घडवतो, याची ही कथा. नागेशनं ही गोष्ट अतिशय साध्या, पण प्रेक्षकांच्या मनाला भिडणाऱ्या पद्धतीनं मांडली होती. इक्बालचा संघर्ष हा जणू भारतात क्रिकेट खेळू इच्छिणाऱ्या, पण विविध कारणांनी तिथपर्यंत पोचू न शकणाऱ्या अनेक मुलांचा प्रातिनिधिक संघर्ष होता. म्हणूनच तो सगळ्यांना एवढा भावला! नागेश कुकनूरची ही एक सर्वोत्तम कलाकृती म्हणता येईल.
नॉन-फिक्शन प्रकारांत क्रिकेटपटूंवरचे बायोपिक बरेच आले. त्यातला नीरज पांडे दिग्दर्शित ‘एम. एस. धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट चांगला चालला. मला स्वत:ला त्यात काहीसं अपुरेपण जाणवलं. अर्थात क्रीडापटूंवर बायोपिक बनवणं सोपं नाही. विशेषतः तो खेळाडू अद्याप खेळत असेल तर खूपच. पण तरीही नीरज पांडे दिग्दर्शक असल्यामुळं अपेक्षा उंचावल्या होत्या. हे सर्व लक्षात घेता, हा सिनेमा वन टाइम वॉच वाटला. धोनीसारख्या खेळाडूचं आयुष्य नक्कीच प्रेरणादायी आहे. पण सिनेमा ते सगळं आयुष्य दाखवत नाही आणि इथंच तो अपुरा वाटतो. एक मात्र आहे. सुशांतसिंह राजपूतनं धोनीचं काम फार मस्त केलं होतं. तो संपूर्ण सिनेमाभर धोनीच वाटतो, हे त्याचं यश. रांचीसारख्या छोट्या गावातून येऊन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि त्यातही सर्वाधिक यशस्वी कर्णधार हा धोनीचा प्रवास खूपच प्रेरणादायक आहे. नीरजसारखा दिग्दर्शक असल्यानं हा प्रवास रोचक पद्धतीनं पाहायला मिळेल, अशा अपेक्षेनं आपण सिनेमा पाहायला सुरुवात करतो. सिनेमा खूपच मोठा आहे. तीन तास दहा मिनिटांचा... त्यामानाने त्यात नाट्यमयता कमी आहे. पूर्वार्धात धोनीचं पूर्वायुष्य आलं आहे. (जी खरंच आपल्याला माहिती नसलेली, म्हणजेच अनटोल्ड स्टोरी आहे..) ही सगळी गोष्ट एकरेषीय पद्धतीनं साकारते. पण त्यात आपल्याला माहिती नसलेल्या अनेक गोष्टी असल्यानं त्यातील रंजकता टिकून राहते. धोनी शाळेत असतानाचं त्याचं फुटबॉलप्रेम, क्रिकेटकडे अपघातानं वळणं इथपासून ते खरगपूर स्टेशनवर टीसी म्हणून त्यानं केलेली नोकरी हा सगळा भाग पूर्वार्धात चांगला जमला आहे. विशेषतः धोनी हा 'यारों का यार' आहे आणि त्याचे सर्व मित्र आणि त्यांनी धोनीच्या उत्कर्षासाठी केलेला आटापिटा हा सर्वच भाग खूपच सुंदररीत्या समोर येतो. उत्तरार्ध धोनीच्या सगळी क्रिकेट करिअरची चढती भाजणी मांडणारा आहे. हा भाग बऱ्यापैकी निराश करतो. धोनीसारख्या छोट्या गावातून आलेला तरुण भारतीय संघात तेव्हा असलेल्या दिग्गजांशी कसा वागतो, कसा बोलतो, संघ उभारणी कशी करतो, त्याच्याविरुद्ध सुरू असलेल्या राजकारणाचा मुकाबला कसा करतो, तो स्वतः इतरांविरुद्ध कसं राजकारण करतो, त्याच्या बाजूनं कोण असतं, विरोधात कोण असतं, हे सगळं यात आपल्याला पाहायला मिळेल, असं वाटतं. पण तसं ते काहीच होत नाही. कारण आपल्याकडं बायोपिक काढण्यासाठी वास्तवाचा कठोर सामना करण्याचं धैर्य ना त्या कथानायकाकडं असतं, ना दिग्दर्शकाकडं! बीसीसीआयचा यातला उल्लेख तर एवढा गुडीगुडी आहे, की हसू येतं. गांगुली, द्रविड, सेहवाग, कुंबळे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ज्याचं पोस्टर लहानपणी धोनीनं हट्टानं विकत घेतलेलं असतं, तो सचिन तेंडुलकर... या सर्वांसोबत खेळण्याची, एवढंच नव्हे, तर त्यांचा समावेश असलेल्या टीमचं नेतृत्व करण्याची संधी धोनीला मिळाली. तेव्हा त्याला काय वाटलं, तो या सगळ्यांशी कसा वागला-बोलला हे पाहण्यात प्रेक्षकांना रस होता. केवढं नाट्य आहे या घटनेत! पण या सगळ्या घटना सिनेमा आला तेव्हा नुकत्याच घडून गेल्यामुळं आणि खुद्द धोनीही तेव्हा वन-डेत का होईना, पण खेळत होता, त्यामुळे त्या सर्वांवर काहीही भाष्य करायला दिग्दर्शकाची छाती झाली नसावी. असो. सिनेमाचा क्लायमॅक्स अर्थातच मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २०११ मध्ये झालेला वर्ल्ड कपचा अंतिम सामना आणि त्यात धोनीनं षटकार मारून भारताला मिळवून दिलेला अविस्मरणीय विजय हाच आहे. किंबहुना याच दृश्यापासून चित्रपटाची सुरुवात होते आणि शेवटही इथंच येऊन होतो... हा क्षण पुन्हा जगण्यासाठी हा सिनेमा आपण पाहू शकतो.
‘धोनी’प्रमाणे ‘अजहर’ हा महमंद अजहरुद्दीनवरचा बायोपिक सिनेमा आला होता. इम्रान हाश्मीने यात अजहरचं काम केलं होतं. हा सिनेमा म्हणजे अजहरवर झालेले मॅच फिक्सिंगचे आरोप कसे चूक होते आणि त्याच्यावर कसा अन्याय झाला, हे सांगण्याचा आटापिटा होता. मात्र, तो अजिबात कन्व्हिन्सिंग नव्हता. त्यामुळेच हा सिनेमा अपयशी ठरला.

त्या तुलनेत अगदी अलीकडं आलेला ‘८३’ हा भारताच्या पहिल्या वर्ल्ड कप विजयावरचा चित्रपट उत्तम झाला होता. कपिल देवच्या जिगरबाज नेतृत्वाखाली जिंकलेल्या या यशोगाथेची कहाणी सांगणारा हा कबीर खान दिग्दर्शित चित्रपट. तो बघताना अनेकदा आपले डोळे पाणावतात. हृदय उचंबळून येतं. देशप्रेमाच्या भावनेनं मन ओथंबून जातं. सिनेमा संपला, तरी किती तरी वेळ हा प्रभाव टिकून राहतो. मी तर हा सिनेमा बघून आल्यावर पुन:पुन्हा त्या अंतिम सामन्याची क्षणचित्रं यू-ट्यूबवर बघितली. परत परत तो अपार जल्लोष, ती उत्कट विजयी भावना मनात साठवून घेतली. एवढा त्या सिनेमाचा प्रभाव होता!
कबीर खाननं ‘८३’ सिनेमा अगदी ‘दिल से’ तयार केला आहे, हे त्या सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये जाणवतं. खरं सांगायचं तर या सिनेमाचा ट्रेलर मी प्रथम पाहिला तेव्हा मला तो काही तितकासा भावला नव्हता. अगदी रणवीरसिंहही कपिल म्हणून पटला नव्हता. इतर खेळाडू तर सोडूनच द्या! मात्र, त्यामुळंच मी अगदी किमान अपेक्षा ठेवून हा सिनेमा पाहायला गेलो होतो. त्या तुलनेत तो खूपच उजवा निघाला आणि अंत:करणापर्यंत पोचला.
हा सिनेमा अर्थातच केवळ वर्ल्ड कपमधल्या त्या विजयापुरता नाही. तो अर्थातच केवळ क्रिकेटपुरताही नाही. भारताला जागतिक स्तरावर एक ताकद म्हणून ओळख मिळवून देणारी, देशवासीयांचा स्वाभिमान जागविणारी, पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणारी अशी ती एक ऐतिहासिक घटना होती. म्हणूनच कबीर खान चित्रपटाच्या सुरुवातीलाच त्या काळात आजूबाजूला घडत असलेल्या घटनांचे सूचक उल्लेख करून आपल्याला त्या काळात नेतो. फूलनदेवी आणि नवाबपूरची दंगल हे त्यातले ठळक उल्लेख.
भारतीय क्रिकेट मंडळ आणि तेव्हाच्या क्रिकेटपटूंची एकूणच सांपत्तिक स्थिती, क्रिकेटच्या जगात, त्यातही वन डे क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं असलेलं स्थान, स्वातंत्र्य मिळून ३५ वर्षं झाली तरी इंग्लंडबाबत मनात असलेली ‘साहेबाचा देश’ ही मानसिकता, इंग्लिश क्रिकेट बोर्ड आणि एकूणच तेथील पत्रकार, सर्वसामान्य यांच्या मनात भारताबद्दल असलेली तुच्छतावादी मानसिकता, वेस्ट इंडिजच्या संघाचा तेव्हा असलेला प्रचंड दबदबा, आपले क्रिकेटपटू आणि त्यांचे कुटुंबीय, आपल्या संघाचे उत्साही आणि धडाकेबाज मॅनेजर मानसिंह असे सगळे बारकावे आणि व्यक्तिरेखा कबीर खाननं अगदी बारकाईनं टिपल्या होत्या. त्यामुळंही हा सिनेमा अधिक भिडला असावा.
रणवीरसिंह कपिल म्हणून शोभत नाही, हे ट्रेलर बघून झालेलं माझं मत सिनेमा बघितल्यानंतर पूर्ण पुसलं गेलं. त्यानं फारच मेहनतीनं ही भूमिका साकारली, यात वाद नाही. श्रीकांत झालेल्या जिवा या अभिनेत्यानं मजा आणली. पंकज त्रिपाठीनं मानसिंहच्या भूमिकेत हा सिनेमा अक्षरश: तोलून धरला, यात दुमत नसावं.
सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्यावर दोन-तीन वर्षांनी‘सचिन : ए बिलियन ड्रीम्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. जेम्स एरिस्काईन यांनी तो दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट म्हणण्यापेक्षा माहितीपट होता, असं म्हणणं योग्य ठरेल. अर्थात सचिनची लोकप्रियता एवढी, की हा माहितीपटही लोकांनी थिएटरला जाऊन पाहिला. सचिनशी बहुतेकांचं नातं भावनिक असल्यानं हा माहितीपट पाहताना, सचिनचं संपूर्ण करिअर पुन्हा अनुभवताना कित्येकदा भावनोत्कट व्हायला झालं. अनेकदा डोळ्यांत अश्रू आले. सचिनचे कौटुंबिक जीवनातील अनेक महत्त्वाचे क्षण या माहितीपटाच्या निमित्ताने सगळ्यांना पाहता आले. महत्त्वाच्या सामन्यांच्या वेळी सचिन काय तयारी करत होता, त्याची मन:स्थिती कशी असायची, कर्णधारपद सोडताना नक्की काय काय घडलं, ‘टेनिस एल्बो’सारख्या त्रासाला तो कसा सामोरा गेला, हे सगळं या चित्रपटातून थोडं फार समजलं. अर्थात, सचिनविषयीची उत्सुकता पूर्ण शमवण्यात हा माहिती-चित्रपट पूर्ण यशस्वी झाला असं म्हणता येत नाही. सचिनवर चित्रपट तयार करणं हे सोपं काम नाहीच. मात्र, भविष्यात त्याच्यावर पूर्ण लांबीचा चित्रपट (माहितीपट नव्हे) तयार होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. अर्थात, त्यासाठी दिग्दर्शक त्या तोलामोलाचा हवा हेही तितकंच खरं.
या पार्श्वभूमीवर अगदी अलीकडं आलेल्या ‘कौन प्रवीण तांबे?’ या चित्रपटाचा उल्लेख आवर्जून करायला हवा. प्रवीण तांबे या क्रिकेटपटूचं नाव हा सिनेमा येण्याआधी खरोखर फार थोड्या लोकांनी ऐकलं होतं. त्यामुळं सिनेमाचं शीर्षक अगदी यथार्थ होतं. हा सिनेमात प्रवीण तांबेचं काम श्रेयस तळपदेनं केलं आहे. ‘इक्बाल’नंतर त्याचा हा दुसरा महत्त्वाचा क्रिकेटपट. अर्थात, या सिनेमात त्याला प्रत्यक्षातील व्यक्तीची भूमिका साकारायची होती. जयप्रद देसाई या दिग्दर्शकाचा हा चित्रपट प्रवीण तांबे या मुंबईतील अवलिया क्रिकेटपटूची कहाणी मांडतो. या प्रवीण तांबेनं वयाच्या ४१ व्या वर्षी एका आयपीएल संघात स्थान मिळवलं, तेव्हा सर्वसामान्य क्रिकेटप्रेमी चकित झाले. ‘हा कोण प्रवीण तांबे?’ असाच प्रश्न सगळ्यांना पडला होता. त्याच प्रवीणचा संघर्षपूर्ण, पण प्रेरणादायी लढा हा सिनेमा आपल्याला सांगतो. श्रेयसनं पुन्हा एकदा यात आपल्या अभिनयाची कमाल दाखवली आहे. क्रिकेटविषयी असलेली प्रचंड आत्मीयता एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काय उलथापालथी घडवू शकते, त्याला कुठून कुठे नेऊ शकते, याचं फार प्रत्ययकारी दर्शन दिग्दर्शकानं या सिनेमात घडवलं होतं. चित्रपटाची कथा लिहिणारे किरण यज्ञोपवित यांनाही या यशाचं श्रेय द्यायला हवं.
लोकप्रिय खेळाडूंचे चरित्रपट येत असतातच. आपल्याकडे आत्ताआत्तापर्यंत क्रिकेट म्हटलं, की फक्त पुरुषांचं क्रिकेट डोळ्यांपुढं येतं. मात्र, अलीकडं महिला क्रिकेटलाही चांगले दिवस येत आहेत आणि ही खूप स्वागतार्ह गोष्ट आहे. शुभांगी कुलकर्णी, डायना एडलजी अशा जुन्या काळातील दिग्गज खेळाडूंसारखा संघर्ष आताच्या पिढीला तुलनेनं कमी करावा लागतोय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) आता पुरुष व महिला खेळाडूंचे सामन्याचे मानधनही एकसारखे केले आहे. आताच्या हरमन प्रीत कौर किंवा स्मृती मानधना यांचीही लोकप्रियता पुरुष खेळाडूंसारखीच आहे. अर्थात भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वांत मोठी खेळाडू म्हणून डोळ्यांसमोर नाव येतं ते मिताली राजचं. मितालीच्या नावे असलेले अनेक विश्वविक्रम आणि खेळातील तिची आकडेवारीच पुरेशी बोलकी आहे. अशा या मितालीच्या आयुष्यावरही ‘शाबाश मितू’ हा चित्रपट आला आहे, ही फार कौतुकाची बाब आहे. श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात मितालीची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूने केली आहे. सुमारे दोन तास ३६ मिनिटांच्या या चित्रपटात मितालीची पूर्ण कारकीर्द उभी करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. दुर्दैवाने ‘बॉक्स ऑफिस’वर या चित्रपटाला फारसे यश लाभले नाही.

ही झाली प्रत्यक्ष क्रिकेटपटूंच्या जीवनावर आधारित काही चित्रपटांची माहिती; मात्र, काल्पनिक कथानक असलेल्या अनेक हिंदी चित्रपटांत या ना त्या प्रकारे क्रिकेट डोकावलं आहे. अगदी जुनं उदाहरण घ्यायचं म्हणजे  देव आनंद व माला सिन्हा यांचा ‘लव्ह मॅरेज’ हा १९५९ मध्ये आलेला सिनेमा. सुबोध मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात नायक देव आनंद हा झाशी शहरातील स्टार क्रिकेटपटू असतो. विशेष म्हणजे सिनेमातलं नाव सुनीलकुमार असतं. नायिका माला सिन्हाला आधी हा नायक आखडू वाटतो, मात्र नंतर त्याचं क्रिकेट पाहून ती त्याच्या प्रेमात पडते वगैरे. देव आनंदचं हे क्रिकेटप्रेम तीस वर्षांनंतरही कायम राहिलं. त्यानं १९९० मध्ये निर्माण केलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘अव्वल नंबर’ या चित्रपटाचं कथानक क्रिकेटकेंद्रितच होतं. कोवळा आमीर खान यात नायकाच्या भूमिकेत होता. गंमत म्हणजे यातही नायकाचं नाव ‘सनी’ असतं. (सुनील गावसकर १९८७ मध्ये निवृत्त झाला होता, आणि सचिनचा उदय व्हायचा होता, अशा काळात हा चित्रपट निर्माण होत होता, हे लक्षात घेतलं पाहिजे.) तर या सनीला क्रिकेट संघात घेतलं जातं, त्याच वेळी रॉनी या दुसऱ्या स्टार क्रिकेटपटूला बाहेर ठेवलं जातं. रॉनी सनीचा बदला घ्यायचं ठरवतो. तेव्हाच एक अतिरेकी क्रिकेटच्या मैदानात बॉम्ब ठेवण्याचा कट रचतो. डीआयजी विक्रमसिंह (साक्षात देवसाब) अर्थातच हा कट उधळून लावतात. भारत वि. ऑस्ट्रेलिया या महत्त्वाच्या सामन्यात मग सनी विजयी खेळी करून भारताला विजय मिळवून देतो, हे ओघानं आलंच. हा देव आनंद यांचा चित्रपट असल्यानं तो ‘अफाट’च होता. तो तिकीटबारीवर जोरदार पडला, हे सांगायची गरज नाही.
अगदी अलीकडच्या काळात म्हणजे २०११ मध्ये अक्षयकुमारचा ‘पतियाळा हाऊस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. भारतीय वंशाचा, इंग्लंडचा फिरकी गोलंदाज माँटी पानेसर याच्या जीवनप्रवासावर ढोबळपणे हा चित्रपट आधारित होता. इंग्लंडकडून क्रिकेट खेळण्याचं मुलाचं स्वप्न आणि वंशवादाच्या भीतीमुळं वडिलांचा होणारा विरोध हा संघर्ष अखेर मुलाच्या कर्तबगारीमुळं संपुष्टात येतो, अशी ही कथा. या चित्रपटाला माफक यश मिळालं. भारतात २०११ चा वर्ल्ड कप भरला होता, त्याच कालावधीत हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. ‘क्रिकेट फीव्हर’मुळे सिनेमाला नक्कीच फायदा झाला.
याशिवाय राणी मुखर्जीचा ‘दिल बोले हडिप्पा’ हा २००९ मध्ये आलेला आणखी एक महत्त्वाचा क्रिकेटविषयक चित्रपट. ‘शी इज द मॅन’ हा चित्रपटावरून (जो मुळात शेक्सपीअरच्या ‘ट्वेल्थ नाइट’वर आधारित होता) प्रेरित होऊन तयार झालेला अनुरागसिंह दिग्दर्शित हा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. शाहीद कपूरने यात नायकाची भूमिका केली होती. क्रिकेट खेळण्यासाठी पुरुष खेळाडू असल्याचं नाटक करणाऱ्या ‘वीरा’ची भूमिका राणीनं ताकदीनं पेलली होती. चित्रपटाचा विषयच असा होता, की त्यात नाट्य भरपूर होतं. शिवाय भारत-पाकिस्तान यांच्यातल्या ‘खुन्नस’ची पार्श्वभूमी होती. हा सगळा तडका, मसाला असल्यामुळं सिनेमा थोडा फार चालला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमानं तेव्हा ६५ कोटींचा गल्ला गोळा केला होता. राणीच्या अभिनयाचं कौतुक झालं. तिला पुरस्कारही मिळाले.
याशिवाय ‘जन्नत’ या २००८ मध्ये आलेल्या इम्रान हाश्मीच्या सिनेमानं क्रिकेटमधील काळे पर्व असलेल्या ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरणावर भाष्य केलं होतं. साधारण त्याआधी दहा वर्षांपूर्वी, म्हणजे १९९९ च्या आसपास संपूर्ण क्रिकेट विश्व मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळं वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. ‘जन्नत’मधून क्रिकेट आणि सट्टेबाजी, क्रिकेट आणि अंडरवर्ल्ड या संबंधांवर दिग्दर्शक कुणाल देशमुखनं भाष्य केलं होतं. या चित्रपटाला चांगलं यश मिळालं. पुढं ‘जन्नत’चे आणखी काही भाग आले आणि तेही यशस्वी झाले. 
‘फेरारी की सवारी’ हा २०१२ मध्ये आलेला राजेश मापुस्कर दिग्दर्शित चित्रपट अतिशय सुंदर होता. या देशातील सर्वसामान्य नागरिकांचं क्रिकेटशी कसं भावनिक नातं आहे, हे या सिनेमात फार लोभसपणे दाखवलं होतं. यात शर्मन जोशी, बोमन इराणी आणि ऋत्विक साहोर या बालकलाकारानं छान काम केलं होतं. चित्रपटात शेवटी साक्षात सचिन तेंडुलकरचं दर्शन होणं हा चाहत्यांना सुखद धक्का होता.
याव्यतिरिक्त २००७ मध्ये आलेला ‘चैन कुली की मैन कुली’, मुथय्या मुरलीधरनचा जीवनपट मांडणारा ‘८००’ किंवा अगदी अलीकडं आलेला ‘मि. अँड मिसेस माही’ असे अनेक चित्रपट क्रिकेटवर आधारित होते. याशिवाय मला ज्ञात नसलेले किंवा स्मरणातून निसटलेले आणखी काही सिनेमे असतीलच. आणखी एक म्हणजे यात प्रामुख्याने मुख्य धारेतील हिंदी सिनेमाचाच विचार केला आहे. प्रादेशिक भारतीय भाषांत तयार झालेल्या, किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर तयार झालेल्या (तसे असतील तर) अन्य चित्रपटांची दखल यात घेतलेली नाही. तशी ती घेणं विस्तारभयास्तव शक्यही नाही.
सुरुवातीला म्हटलं तसं क्रिकेट आणि सिनेमा ही आपल्या देशातील आत्यंतिक आवडीची दोन क्षेत्रं. ती एकत्र आणण्याचा मोह भल्याभल्या चित्रकर्मींना झाला. काही यशस्वी झाले, तर काही फसले. कितीही मोठा खेळाडू असला, तरी तो प्रत्येक सामन्यात शतक करू शकत नाही, तसंच हे आहे. मात्र, यातल्या जमलेल्या कलाकृतींनी आपल्या मनमुराद आनंद दिला आहे, यात शंका नाही.


(पूर्वप्रसिद्धी : क्रिककथा दिवाळी अंक, २०२४)

-------

14 Feb 2025

मुंबई ट्रिप ८-२-२०२५

मोठं होत जाण्याचं सुरेल गाणं...
-------------------------------------


मित्र डॉ. सलील कुलकर्णी व संदीप खरे यांच्या ‘आयुष्यावर बोलू काही...’ या कार्यक्रमाचा दोन हजारावा प्रयोग मुंबईतील नीता मुकेश अंबानी सेंटरमधील ‘ग्रँड थिएटर’मध्ये होणार आहे, हे कळलं त्याच वेळी या कार्यक्रमाला आपण जायचंच हे मी मनोमन निश्चित केलं होतं. ‘आयुष्यावर बोलू काही...’ (एबीके) कार्यक्रम २००३ मध्ये सुरू झाला. गेली २२ वर्षं तो सतत सुरू आहे. अर्थात सलील व संदीप या दोघांशीही माझी मैत्री या कार्यक्रमापेक्षा जुनी. संदीप व मी तर एकाच कॉलेजचे - पुण्यातील गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकचे. मी पहिल्या वर्षाला होतो, तेव्हा संदीप तिसऱ्या वर्षाला (इलेक्ट्रिकल) होता. त्या वर्षीच्या गॅदरिंगमध्ये त्यानं ‘मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यांत’ हे गाणं स्वत: पेटी वाजवून म्हटलं होतं. म्हणजे हे गाणं मी आता ३० हून अधिक वर्षं ऐकतो आहे. (आम्ही तेव्हा काही एकमेकांना भेटलो नाही व मित्रही झालो नाही. नंतर मी ‘सकाळ’मध्ये असताना आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी त्याला हा किस्सा सांगितला होता. तेव्हापासून संदीप मला ‘कॉलेज मित्र’च म्हणतो.) सलीलची ओळखही मी १९९७ मध्ये ‘सकाळ’मध्ये रुजू झाल्यानंतरचीच. सलील व संदीपच्या कार्यक्रमांवर मी आमच्या ‘कलारंजन’ पुरवणीत तेव्हा काही छोटेखानी लेखही लिहिले होते. या दोघांचा ‘आयुष्यावर बोलू काही...’ हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा मी तो लगेचच पाहिला. बहुतेक टिळक स्मारक मंदिरात असेल. या कार्यक्रमाचा ताजेपणा व तारुण्य दोन्ही चटकन जाणवलं. पुढं अनेकदा हा कार्यक्रम ऐकला. कॅसेट आणल्या. सीडी आणल्या. नंतर कार घेतल्यावर याच सीडी सतत वाजत असायच्या. पुढचेही सगळे अल्बम विकत घेतले आणि सतत ऐकत राहिलो....
...म्हणूनच परवा, ८ फेब्रुवारीला ‘एनएमएसीसी’च्या भव्य प्रयोगाच्या सुरुवातीलाच शुभंकर व रुमानी यांनी निवेदन केलं, तेव्हा मला अगदी भरून आलं. कार्यक्रम सुरू झाला आणि सलील व संदीपनं ‘जरा चुकीचे... जरा बरोबर...’ म्हणायला सुरुवात केल्याबरोबर नकळत डोळे वाहू लागले. असं का व्हावं, याचं मला आश्चर्य वाटलं. पण नंतर जाणवलं, की ही तर आपल्याच मोठं होण्याची गोष्ट आहे. सलील, संदीप व मी जवळपास समवयस्क. मी थोडा लहानच त्यांच्यापेक्षा. पण आमची मुलं साधारण एकसारख्या वयाची. ‘अग्गोबाई, ढग्गोबाई’वर महाराष्ट्रातल्या अगणित आयांनी आपापल्या मुलांची जेवणं केली तसं आम्हीही नीलला भरवलं आहे. शुभंकर किंवा रुमानी जसे मोठे झाले तसाच नीलही आता मोठा झाला आहे. ‘आयुष्यावर बोलू काही’चा पाचशेवा प्रयोग गणेश कला-क्रीडा मंच इथं झाला होता. तेव्हा नील बराच लहान होता. तो कार्यक्रम ‘झी मराठी’वर नंतर सादर झाला होता. त्यात काही सेकंद लहानग्या नीलवर कॅमेरा गेलेला आहे. आम्हाला अक्षरश: सर्व महाराष्ट्रातून नातेवाइकांनी फोन करून नीलला पाहिल्याचं कळवलं. आम्हीही तो कार्यक्रम कधीही परत टीव्हीवर लागला, की नील दिसेल म्हणून परत परत पाहत असू. अशा वेगळ्याच रीतीनं तोही या कार्यक्रमाशी जोडला गेला आहे. शुभंकरचं गाणं त्याला आवडतं. एकदा पुण्यातल्या त्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (२०१७) कुप्रसिद्ध कसोटी सामन्यात सलील त्याच्या लेकीला - अनन्याला घेऊन आला होता आणि मी नीलला घेऊन गेलो होतो. दुर्दैवानं त्या वेळी एकाच सत्रात आपला डाव गडगडला आणि आम्ही लगेच तिथून निघालो. आमची मुलं अशी सोबत मोठी होत असल्यानं आणि त्यांच्यासोबत आम्हीही पालक म्हणून मोठे होत असल्यानं, ‘एबीके’ हा नुसता कार्यक्रम न राहता, आमच्यासाठी ती एक भावना झाली आहे. कार्यक्रम सुरू होताना डोळ्यांत पाणी का तरळलं, याच्यामागं ही सगळी अबोध कारणं होती. असो.
नीता मुकेश अंबानी सेंटर (एनएमएसीसी) सुरू झाल्यावर आम्ही लगेचच तिथं जाऊन ग्रँड थिएटरला ‘इंडियन म्युझिक फेस्टव्हल’ हा अजय-अतुल यांचा भव्य कार्यक्रम पाहिला होता. त्यानंतर मात्र तिथं काही जाणं झालं नव्हतं. त्यामुळं आता एक मराठी, कवितेचा कार्यक्रम - तोही आपल्या मित्रांचा - होतोय म्हटल्यावर आम्ही लगेचच जायचं निश्चित केलं. बऱ्याचदा अशा ट्रिपच्या वेळी आमच्यासोबत असणारा माझा आतेभाऊ साईनाथ, वहिनी वृषाली व त्यांचा मुलगा अर्णव हेही आमच्यासोबत येणार होते. मग आम्ही एक ‘इनोव्हा’ बुक केली आणि रीतसर एक दिवसाची ट्रिपच ठरवली. मला ते टूर ऑपरेटर तयार करतात, तसा प्रवासाचा कार्यक्रम आखायला आवडतं. आम्हाला नुकताच सुरू झालेला अटल सेतू पाहायचा होता, नवा कोस्टल रोडही पाहायचा होता. मुंबईचा भूगोल मला तोंडपाठ असल्यानं कुठून कुठं, कसं जाणं सोयीचं पडेल हे मला माहिती होतं. अटल सेतूवरून भायखळ्याच्या जिजामाता बागेत असलेल्या भाऊ दाजी लाड म्युझियमला जाणं सोयीचं पडेल, हे लक्षात आलं होतं. हे म्युझियम आम्ही मागे गेलो होतो, तेव्हा बंद होतं. आता नूतनीकरणानंतर ते सुरू झाल्याचं मी बातम्यांत पाहिलं होतं. साईनाथ व मला दोघांनाही संग्रहालयं बघण्यात रुची आहे. त्यामुळं भाऊ दाजी लाड म्युझियमला जाणं नक्की केलं. नंतर कोस्टल रोडनं वांद्र्याला जाऊन, बीकेसीत नीता मुंकेश अंबानी सेंटरला जाणं अगदीच सोयीचं होतं. त्यानुसार सगळं नियोजन केलं. कार्यक्रम रात्री अकराच्या पुढं संपेल आणि तिथं जेवायला थांबलो तर उशीर होईल, हे लक्षात घेऊन निघतानाच पॅक डिनर सोबत घेतलं.
शनिवारी सकाळी बरोबर आठ वाजता कार बोलावली होती. साईनाथची फॅमिली आमच्याकडं येऊन निघेपर्यंत आम्हाला साडेआठ झाले. बरोबर दहा-सव्वादहा वाजता आम्ही खालापूरच्या फूड मॉलवर होतो. तिथं ब्रेकफास्ट करून लगेच निघालो. जेएनपीटीची (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) एक्झिट घेऊन आम्ही अटल सेतूच्या रस्त्याला लागलो. मी पहिल्यांदाच या रस्त्यानं जात होतो. हा रस्ता न्हावाशेवा बंदराकडं जात असल्यानं रस्त्यानं स्वाभाविकच कंटेनरची मोठी गर्दी होती. अटलसेतू बराच पुढं होता. त्या सेतूपासून एक्स्प्रेस-वेपर्यंत स्वतंत्र उड्डाणपूल केल्याशिवाय ही कनेक्टिव्हिटी सुलभ व वेगवान होणार नाहीय, हे लगेच लक्षात आलं. साधारण २५ ते २७ किलोमीटर अंतर प्रवास केल्यानंतर आम्ही अटल सेतूच्या रस्त्याला वळलो. डावीकडं एक वळण घेऊन आम्ही उड्डाणपुलावर आलो. इथूनच अटल सेतू खरं तर सुरू होत होता. हा उड्डाणपूल खालच्या रस्त्याला आडवा छेदून काहीसा उत्तरेला जातो व एका डोंगराच्या बाजूनं शार्प वळण घेऊन पुन्हा पश्चिमेकडं वळतो. तिथंच टोल नाका आहे. तो पार केल्यावर खरा अटल सेतू सुरू झाला. ‘मुंबई २५ किलोमीटर’ अशी पाटी दिसली. अटल सेतूवर सर्वत्र कॅमेरे आहेत आणि वेगमर्यादा पाळूनच गाडी चालवावी लागते. त्यामुळं आमचा ड्रायव्हर त्या मर्यादेत, पण एका लयीत कार चालवत होता. त्या दिवशी (आणि बहुतेक कायमच) त्या सगळ्या परिसरात धुरकं असल्यानं आम्हाला आजूबाजूचा परिसर नीट दिसतच नव्हता. त्यात काही ठिकाणी सुरक्षेच्या कारणासाठी दोन्ही बाजूंनी उंच उंच अडथळे उभारले आहेत. उजवीकडं ट्रॉम्बेची अणुभट्टी असल्यानं ती बाजू झाकलेली समजू शकतो. मात्र, डावीकडंही तेवढेच उंंच पत्रे लावून पलीकडचं काही दिसण्याची सोयच ठेवलेली नाही. अर्थात हे अडथळे सर्वत्र नाहीत. थोडं पुढं गेल्यावर डावीकडं अगदी धुरकट असं समुद्राचं पाणी दिसू लागलं. नंतर घारापुरीचा डोंगरही अस्पष्ट दिसू लागला. दोन वर्षांपूर्वी आम्ही घारापुरीला आलो होतो, तेव्हा या पुलाचं काम चालू असलेलं बोटीतून बघितलं होतं. आज त्या पुलावरून घारापुरीचा डोंगर पाहत होतो. एकूणच अटल सेतूवरचा हा प्रवास अतिशय सुखद आणि अभिमानास्पद म्हणावा असा होता. अगदी अर्ध्या तासात एकदम आम्हाला वडाळा, शिवडीचा परिसर दिसू लागला आणि एक से अक अजस्र स्कायस्क्रेपरही दिसू लागल्या. इथं सगळीकडं पाट्या लावल्या असल्या आणि मी ‘गुगल मॅप’ लावला असला, तरी वडाळ्याकडं वळायचं सोडून आम्ही पुढंच गेलो. आता परतीचा मार्ग नव्हता. मग बरंच पुढं जाऊन, ईस्टर्न फ्री वेवरून उतरून, यू टर्न घेऊन आम्ही पुन्हा मागं आलो. अर्थात, ठरलेल्या वेळेच्या आत, म्हणजे बरोबर १२ वाजून १० मिनिटांनी आम्ही भायखळ्याच्या जिजामाता उद्यानाच्या पार्किंगमध्ये होतो. 

शनिवार असल्यानं उद्यानात गर्दी होती. आम्हाला संग्रहालयात जायचं असल्यानं तिथली तिकिटं काढली. (प्रत्येकी २० रुपये फक्त) इथं दर शनिवारी साडेबारा वाजता मराठीतून म्युझियम टूर असते, हे मला माहिती होतं. त्याप्रमाणे तिथल्या कर्मचाऱ्यांना विचारल्यावर त्यांनी ‘त्या मॅडम तिथं एका ग्रुपला माहिती सांगत आहेत,’ असं सांगून त्यांच्याकडं पिटाळलं. त्या मॅडम पाच-सहा जणांच्या एका ग्रुपला इंग्रजीतून (बहुदा त्यात एक परदेशी व्यक्ती असल्यानं) माहिती सांगत होत्या. खरं तर संग्रहालयात सर्व दालनांत माहिती लिहिलीच होती. मग आम्ही त्या मॅडमचा नाद सोडला आणि आपले आपले संग्रहालय फिरायला लागलो. या संग्रहालयाचं मूळ नाव ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’ असं होतं आणि ते १८७२ मध्ये सुरू झालं आहे, ही माहिती मला नवीन होती. दीड वर्षांपूर्वी आम्ही लंडनला गेलो असताना, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमसमोर अर्धा तास बसूनही केवळ कंटाळा आल्यानं ते म्युझियम बघितलं नव्हतं. (याच संग्रहालयात वाघनखं आहेत हे मला तेव्हा माहिती नव्हतं. नंतर ती साताऱ्यातील संग्रहालयात आली तेव्हा मी व साईनाथनं खास ती बघायला सातारा ट्रिप केली होती.) तर त्याच मूळ नावाचं संग्रहालय आता तरी बघता आलं, याचा एक कोमट आनंद माझ्या मनाला झाला. संग्रहालयाच्या मधोमध त्या युवराज अल्बर्टचा पूर्णाकृती संगमरवरी पुतळा उभारलेला आहेच. संग्रहालय छोटेखानी असलं, तरी आकर्षक आहे. मला तिथं वरच्या मजल्यावर असलेलं, मिनिएचर पुतळ्यांनी सजलेलं दालन विशेष आवडलं. 
संग्रहालयाच्या मागं एक छोटंसं कॅफे आहे. तिथं बसून छान ताक प्यायलो. आता भूक लागली होती. ‘गुगल’वरच जवळपास रेस्टॉरंट शोधलं. अगदी जवळ एक इसेन्स नावाचं रेस्टॉरंट असल्याचं कळलं. मग तिथं गेलो. ते एक हेरिटेज नावाचं जुनं, बैठं असं छान हॉटेल होतं. त्यांचंच हे रेस्टॉरंट होतं. एसी होतं हे महत्त्वाचं. मग तिथं छान, भरपेट जेवलो. तिथले काका मराठीच होते आणि त्यांनी आमची अगदी उत्तम सरबराई केली. बिलही तुलनेनं माफकच होतं. (पुण्याबाहेर गेलं, की हे फार प्रकर्षानं जाणवतं. सगळं स्वस्तच वाटायला लागतं.) 
तिथून आम्हाला कोस्टल रोडला जायचं होतं. पण नीलला राजाबाई टॉवर बघायचा होता. मग टूर कंपन्यांच्या भाषेत आम्ही तिथं एक ‘फोटो स्टॉप’ घेतला. नील व अर्णव खाली उतरले आणि त्या टॉवरचे व परिसराचे भराभर फोटो काढून आले. थोड्याच वेळात आम्ही मरीन ड्राइव्हच्या रस्त्यावर आलो. दोन वर्षांपूर्वी आलो होतो, तेव्हा या कोस्टल रोडच्या कामासाठी सगळं खोदून ठेवलेलं पाहून वैतागलो होतो. आता त्याच कोस्टल रोडमधून आम्ही निघालो होतो. छत्रपती संभाजीमहाराज किनारी मार्ग मरीन ड्राइव्हपासून बोगद्यात शिरतो, तो थेट पश्चिम किनाऱ्यावर बाहेर पडतो. तिथून खऱ्या अर्थानं कोस्टल रोड सुरू होतो. आम्ही अगदी क्षणार्धात हाजी अलीपाशी आलो. इथून सगळीकडं जाण्यासाठी वेगवेगळे फाटे काढण्यात आले आहेत. रस्त्यावर पाट्या आहेत, पण तरीही गोंधळ होऊ शकतो. आम्ही चुकलो. आमच्याप्रमाणे आणखी दोन ट्रॅव्हल कारही चुकल्या. मग रिव्हर्स घेऊन योग्य रस्त्याला लागलो. पण पुढं गेल्यावर पुन्हा चुकलो. मात्र, मला कोस्टल रोडवरूनच जायचं असल्यानं मी आमच्या ड्रायव्हरला यू टर्न घ्यायला लावला आणि आम्ही वरळीतून पुन्हा रॅम्पवर आलो. आता मात्र आम्ही योग्य रस्त्याला लागलो. हा कोस्टल रोड जिथं जुन्या सागरी सेतूला मिळतो, तिथं निळ्या आकाराच्या दोन लोखंडी कमानी उंच अशा दिसतात. त्या लांबूनही दिसत होत्या. त्यामुळं आम्हाला आपोआप दिशादर्शन झालं. कोस्टल रोडवरून जुन्या सागरी सेतूवर आपण अगदी ‘सीमलेस’ म्हणतात तसं जातो. वरळीकडून जुन्या सेतूवर जायला डाव्या बाजूनं आता एका नव्या रॅम्पचं काम सुरू आहे. काही दिवसांत ते पूर्ण होईल. वांद्रे बाजूच्या टोल नाक्यानंतर आम्ही लगेचच बीकेसीत शिरलो. आमच्या अपेक्षित वेळेच्या अर्धा तास आधीच, म्हणजे दुपारी चार वाजता आम्ही ‘एनएमएसीसी’त पोचलो. पार्किंगला गाडी लावून, मग वर जिओ प्लाझात आलो. तिथं टाइमपास केला. पुण्याहून आलेली काही मंडळी भेटली. साईनाथ व वृषाली पहिल्यांदाच इथं येत होते. मग तो सगळा एरिया त्यांना फिरून दाखवला. तिथं चहापान झालं. थोडं निवांत बसलो. मग फ्रेश झालो. बरोबर सात वाजता प्रेक्षकांना ‘ग्रँड थिएटर’मध्ये आत सोडायला सुरुवात झाली. 
आमच्या दोन्ही मुलांची तिकिटं अगदी पुढं, म्हणजे दुसऱ्या रांगेत होती. आमची साधारण बाराव्या लायनीत होती. मागच्या वेळी आम्ही मधल्या बाल्कनीत बसलो होतो. त्या तुलनेत अगदी खाली बसल्यावर हे थिएटर आणखी भव्य वाटत होतं. बरोबर साडेसातला कार्यक्रम सुरू झाला. पुढचे तीन तास म्हणजे निव्वळ नॉस्टॅल्जिया, धमाल गाणी, आठवणी असं सगळंच होतं. सलील हा मैफलींचा राजा आहे. त्याला मैफल ताब्यात कशी घ्यायची हे व्यवस्थित कळतं. त्यामुळं त्याच्या मैफली रंगत नाहीत, असं सहसा होत नाही. संदीपची हजरजबाबी आणि नेमकी साथ असतेच. ग्रँड थिएटरचं एकूण लायटिंग, नेपथ्य अपेक्षेप्रमाणे भव्य व नेत्रदीपक होतं. सलील व संदीपचे सर्व सहवादक कलाकार आदित्य आठल्ये, डॉ. राजेंद्र दूरकर, रितेश ओहोळ आणि अनय गाडगीळ या सर्वांनी उत्तम साथसंगत केली. आर्या आंबेकर आणि शुभंकर यांनीही काही गाणी म्हटली. ‘एकटी एकटी घाबरलीस ना आई...’ या गाण्याच्या वेळी सलीलनं ‘कोल्ड प्ले’प्रमाणे सर्व प्रेक्षकांना मोबाइलची बॅटरी लावायला सांगितली. क्षणार्धात त्या सभागृहात दीड-दोन हजार हात मोबाइलचा लाइट लावून हलू लागले. ते दृश्य अभूतपूर्व होतं. मराठी कवितेच्या कार्यक्रमाला मिळणारा हा जबरदस्त प्रतिसाद केवळ भारावून टाकणारा होता, यात शंका नाही. या गाण्यानंतर शुभंकरसाठी सलग दोन मिनिटं आम्ही टाळ्या वाजवत होतो, एवढं तो सुंदर गायला. सलीलला अगदी भरून आलं, हे जाणवत होतं. अनेक गाण्यांना ‘वन्स मोअर’ मिळाले, अनेक गाणी सर्वांनी मिळून म्हटली. एकूण ही प्रेक्षकांनीही रंगवलेली मैफल होती. ‘एबीके’च्या बहुतेक प्रयोगांना असाच अनुभव येतो. दोन हजारावा ‘ग्रँड’ प्रयोगही त्याला अपवाद नव्हता. केवळ मुंबईच नव्हे, तर ठाणे, पुणे, नाशिक अशा सर्व ठिकाणांहून रसिक इथं आले होते आणि सलील-संदीपनं कुणालाही निराश केलं नाही.

कार्यक्रम संपल्यावर बाहेर कॅफेटेरियाच्या परिसरात त्या दोघांना भेटायला एकच झुंबड उडाली होती. त्या गर्दीत आम्हीही घुसलो आणि फोटो काढून घेतले. एरवी त्यांना भेटतच असतो, पण या विशेष मैफलीचे फोटो आम्हाला हवेच होते. कार्यक्रम संपल्यावर थोडा वेळ अशी एक शून्यावस्था येते. आम्ही पार्किंगमध्ये जाऊन कारमध्ये बसेपर्यंत आम्ही एकमेकांशी काहीही बोललो नाही. एका अविस्मरणीय मैफलीला मिळालेली ती ‘दिल से’ दाद होती. साडेअकराला पुण्याकडं निघालो. कारमध्येच सगळ्यांनी खाऊन घेतलं. सगळ्यांना झोप येत होती. मधे फूड मॉलला थांबून ड्रायव्हरदादाचं चहा-पाणी झालं. बरोबर अडीच वाजता घरी येऊन पोचलो. घरात गादीला पाठ टेकताच गाढ झोप आली. स्वप्नात मात्र ‘एबीके’ची मैफल सुरूच राहिली...

---

याआधीच्या मुंबई ट्रिपवरचा ब्लॉग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-----

वाघनखं पाहण्यासाठी केलेल्या सातारा ट्रिपवरचा ब्लॉग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----

21 Jan 2025

खाण्याचे गाणे - भाग ४ ते ६

खाण्याचे गाणे - ४
----------------------


मी १९९७ मध्ये ‘सकाळ’मध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून रुजू झालो, तेव्हा आम्हाला दुपारी ३ ते ९.३० आणि संध्याकाळी ६.३० ते १२.३० अशा दोन शिफ्ट जास्त करून असायच्या. अर्थात मी तेव्हा बॅचलर असल्यानं आणि रूमवरच राहत असल्यानं मी या ठरलेल्या वेळांपेक्षा अधिक वेळ ऑफिसमध्ये असायचो. यात रात्रीच्या जेवणाचे जरा हालच व्हायचे. मी राहत होतो, ती जहागीरदारांची मेस ऑफिसपासून चालत अगदीच जवळ होती. त्यामुळं मी तिकडं चालत जाऊन जेवून यायचो, पण अनेकदा ऑफिसच्या व्यापात बाहेर पडायला वेळ व्हायचा नाही. मग समोर असलेल्या ‘शारदा’मध्ये जाऊन काही तरी डोसा, उत्तप्पा वगैरे खाऊन यायचं. तरी ११ वाजता पुन्हा भूक लागायची. मग मी व माझा सहकारी श्रीपाद कुलकर्णी शनिवारवाड्यावर जायचो. तेव्हा समोर मोकळं मैदान होतं. आत्ता जी दगडी भिंत घातली आहे, ती नव्हती. त्या मैदानात चौपाटी असायची. भेळेच्या गाड्या असायच्या. मग तिथं जाऊन पाच की दहा रुपयांची भेळ खायची. तिथून पुन्हा ऑफिसला यायचं. सगळी पानं छापायला गेली, की मग मंडईत जायचं. तेव्हा प्रिंटिंग खालीच होत असल्यानं अनेकदा ताजा अंक घेऊनच आम्ही बाहेर पडायचो. मंडईत तेव्हा मार्केट उपाहारगृह हे एकमेव हॉटेल सुरू असायचं. तिथं जाऊन झणझणीत मिसळ किंवा भजी किंवा कटवडा असले ज्वलज्जहाल पदार्थ खायचे आणि चहा-सिगारेट मारायची, असा बऱ्याच पत्रकारांचा क्रम होता. या हॉटेलमध्ये गावभरातले ‘नाइट किंग’ जमायचे. पलीकडं ‘प्यासा’ हा प्रसिद्ध बार कम गुत्ता होता. ‘मार्केट’च्या अगदी शेजारीही एक बार होता, त्याचं नाव विसरलो. या दोन्ही ठिकाणांहून झुलत झुलत मंडळी यायची. अर्थात त्यांचा काही त्रास नसायचा. ती शांतपणे सँपल-पाव किंवा भजी खायची. तिथं थाळीसारखं जेवणही मिळायचं. कुणी ती थाळी खात असायचं. एकूण तिथली स्वच्छता वगैरे ‘अहाहा’च होतं सगळं. पण आम्हाला त्याचं काही नसे. समोर मंडईच्या आत खन्ना अंकलचा अड्डा भरायचा. पुण्याचे माजी उपमहापौर रमेश खन्ना यांचे बंधू किशोर खन्ना म्हणजे आमचे खन्ना अंकल. (ते अलीकडेच निवर्तले.) त्यांचा दुधाचा व्यवसाय होता. त्यांना सकाळी चार-साडेचारला दूध घालायला जायचं असायचं. तोवर पत्रकार मंडळींचा अड्डा रंगलेला असायचा. त्यात सर्वच वृत्तपत्रांचे पत्रकार असायचे. खेळीेमळीने गप्पा चालायच्या. बऱ्याच वेळा सुधीर गाडगीळही यायचे. काही राजकीय कार्यकर्ते, नेतेही चक्कर टाकायचे. तिथं अनेक गोष्टी अनौपचारिक गप्पांमधून कळायच्या. मी तिथून अगदीच चालत जाण्याच्या अंतरावर राहत होतो. मग पुन्हा एकदा चहा घ्यायचा आणि पहाटे चारला वगैरे रूमवर जाऊन झोपायचं.
माझी साप्ताहिक सुट्टी शनिवार होती, त्यामुळे शुक्रवारी रात्री काम संपलं, की मला नगरला घरी जायचं असे. मग मी ऑफिसातल्या माझ्या शिफ्टच्या सहकाऱ्यांना मला शिवाजीनगरला सोडायला सांगे. तेही सगळेच्या सगळे मला सोडायला येत. त्याचं कारण तिथं रात्री उशिरा सुरू असलेलं कँटीन. स्टँडच्या समोर एक इराणी हॉटेल होतं. त्याचं नाव विसरलो. तिथं आम्लेट-पाव किंवा भुर्जी वगैरे मिळे. स्टँडच्या आत एसटीचं मोठं कँटीन होतं. तिथं केवळ फरसाण आणि त्यावर तिखट कट टाकलेली मिसळ मिळे. पण मला त्या मिसळीची चव आवडायची. मी हमखास ती मिसळ खायचो आणि पहाटे तीन वाजताची बस पकडून नगरला जायचो. कधी घरी जायचं नसल्यास त्या आठवड्यात आम्ही स्वारगेटला जायचो. तिथं आत डेपोकडं जायच्या बाजूला एक भेळवाला होता. तो एवढ्या रात्रीही सुरू असायचा. मग तिथं भेळ खायची. तिथंच चार वाजेपर्यंत गप्पा मारायच्या आणि मग निघायचं. नळस्टॉपचं ‘अमृतेश्वर’ तेव्हाही प्रसिद्ध होतं. भल्या पहाटे चार वाजता ते सुरू व्हायचं. तिथं पोहे खायला झुंबड उडायची. (अजूनही उडते, असं ऐकून आहे. आता कैक वर्षांत एवढ्या पहाटे तिथं जाणं झालेलं नाही.) मुळात अप्पा बळवंत चौक, नळस्टॉप, शिवाजी पुतळा ही वृत्तपत्र विक्रेत्यांची वितरणाची मोठी केंद्रे आहेत. मोठे वितरक इथून लहान वितरकांकडे पेपरचे गठ्ठे सोपवतात. त्यामुळं त्या लोकांची या सर्व ठिकाणी पहाटेच वर्दळ सुरू होते. त्यांच्यासाठी ही चांगली सोय होती. मेट्रोच्या कामासाठी शिवाजीनगर स्टँड पाडलं, तेव्हा मला अतोनात दु:ख झालं. ते स्टँड, तिथं समोर असलेली अनेक हॉटेल्स हा आमच्या खाद्यजीवनाचा फार महत्त्वाचा भाग होता.
मंडई विद्यापीठ कधीच बंद पडलं. त्यानंतर भिडे पुलाजवळ झेड ब्रिजखाली मोठी चौपाटी सुरू झाली. तिकडंही काही पत्रकारांनी अड्डा सुरू केला. मात्र, माझं मन तिकडं फारसं रमलं नाही. गरवारे कॉलेजसमोर अनिल पानवाल्याचा अड्डाही प्रसिद्ध होता. मात्र, मी तिकडं नसायचो. मोठमोठे पत्रकार मात्र तिथं आवर्जून जायचे. समोर असलेलं कॅफे पॅरेडाइज हाही एके काळी असा अड्डा होता.
गेल्या २७-२८ वर्षांत काळ इतक्या वेगानं बदलला, की यातल्या बऱ्याच गोष्टी आता फक्त आठवणींतच उरल्या आहेत. मंडई कायम असली, तरी आमचा तिथला अड्डा संपला, याची खंत कायम वाटत राहील...


----


खाण्याचे गाणे - ५
----------------------


मी ‘सकाळ’मध्ये असताना १९९७ मध्ये खाण्यासाठी आसपास भरपूर ठिकाणं होती. त्यापैकी ‘शारदा’ आणि शनिवारवाड्यावरची चौपाटी यांचा उल्लेख आधीच्या पोस्टमध्ये आलाच आहे. त्याव्यतिरिक्त आमची आणखी काही आवडती ठिकाणं होती. तपकीर गल्लीच्या तोंडाशी असलेला गाडगीळ यांचा वडा खायला अनेकदा जायचो. यांचा वडा सुंदर असायचाच, पण त्यांच्याकडं ओल्या नारळाची करंजी मिळायची ती फार चविष्ट असायची. अलीकडं अनेक वर्षांत तिथं जाणं झालेलं नाही. नवग्रह शनी मंदिराच्या शेजारी एक इडलीवाला होता. तिथं अतिशय स्वस्तात इडली-चटणी मिळायची. लाल महालासमोर कॉर्नरला एक हॉटेल होतं. त्याचं नाव विसरलो. बहुदा श्रीकृष्ण की असंच काही तरी होतं. तिथंही क्वचित प्रसंगी जायचो. आमच्या ऑफिसकडून ‘शारदा’कडं जाताना डाव्या हाताला करंबेळकर यांची डेअरी होती. तिथं अतिशय छान ताक मिळायचं. साबुदाणा खिचडीही मिळायची. त्या वेळेच्या मानाने ती जरा महाग असायची. पण आम्ही कधी तरी जायचो. त्या मालकांचा एकूण दृष्टिकोन ‘शक्यतो गिऱ्हाइक कमीच आलं तर बरं,’ असा असावा. पण नेहमी हसतमुख असायचे. (यावरून ‘केसरी’समोरच्या प्रसिद्ध वडेवाल्यांचा सुधीर गाडगीळांनी सांगितलेला किस्सा आठवला. त्यांना एकदा गाडगीळांनी विचारलं होतं, की अहो, तुमच्या शेजारी एवढा मोठा सवाई गंधर्व महोत्सव भरतो, तर तुम्ही कधी तिथं स्टॉल का नाही लावत? किंवा हॉटेल रात्री उशिरापर्यंत उघडं का नाही ठेवत? त्यावर ते म्हणाले होते, ‘छे हो... फार लोक येतात...’)

‘शारदा’च्या समोर ‘मार्केट’ नावाचं अगदी छोटेखानी हॉटेल होतं. मंडईतल्या ‘मार्केट उपाहारगृहा’चेच हे भाऊबंद होते. इथं मिसळ बरी मिळायची. वडा आणि मिसळीचं सँपल आणि पाव असं घेऊन आम्ही कैकदा खायचो. अप्पा बळवंत चौकात नंतर एक भज्यांचं दुकान सुरू झालं होतं. तिथली मूगभजी छान असायची. मात्र, ते लवकरच बंद पडलं. ‘रतन’समोर फरासखाना पोलिस ठाण्याच्या दारात ‘रामचंद्र भगवंत चिवडेवाले’ यांची गाडी असायची. अनिल अवचट यांच्या लेखातून मला हे आधीच माहिती झाले होते. त्यांची गाडी प्रत्यक्ष दिसल्यावर मला फार आनंद झाला होता. मी अनेकदा तिथं चिवडा खायला जात असे. अत्यंत उत्कृष्ट असा तो चिवडा, त्यावर कांदा, लिंबू आणि एकच मिरची ते द्यायचे. जादा काहीही मागितलं, तरी त्यांच्या चेहऱ्यावर रुष्ट झाल्याचे भाव स्पष्ट दिसायचे. ‘मी केलेलं मिश्रण बरोबर आहे, तेच चवदार लागेल, तुम्ही अतिरिक्त लिंबू पिळून किंवा कांदा घालून ते बिघडवू नका,’ असं एकंदर त्यांचं म्हणणं असायचं. बहुतेक तशी पाटीही त्यांनी तिथं लावली होती. पांढरास्वच्छ शर्ट, पायजमा आणि गांधीटोपी घातलेले ते घाटगेकाका अजूनही माझ्या डोळ्यांसमोर आहेत. नंतर नंतर ते थकले आणि मुलगा व्यवसाय पाहायला लागला. मात्र, नंतर ही गाडी तिथं दिसेनाशी झाली. अर्थात, अनिल अवचटांच्या लेखानं त्यांना अजरामर केलं आहे. बुधवार चौकात रात्री पलीकडच्या कोपऱ्यात अगदी रस्त्यावर ॲल्युमिनियमचं भांडं घेऊन ‘कवी बासुंदी’वाले बासुंदी विकत बसलेले असायचे. अतिशय गोड अशी ही बासुंदी खायला तिथं रात्री गर्दी असायची. ‘लोकसत्ता’तले आमचे ज्येष्ठ सहकारी विनायक करमरकर ऊर्फ पंत यांनी ‘रात्रीचे पुणे’ अशी एक बहारदार लेखमाला लिहिली होती. त्यात त्यांनी या कवी बासुंदीविषयी तपशिलात लिहिलं आहे. नंतर नंतर ‘रतन’ आणि फरासखान्यासमोर रात्री मोठी खाऊ गल्लीच भरायला लागली. त्यात अप्प्यांपासून ते वडा, भजी असे अनेक पदार्थ मिळत. मात्र, मी फार क्वचित तिकडं फिरकलो.
आमच्या ऑफिसकडून जोगेश्वरीकडं जायला लागलं, की मधे पूना बेकरी लागते. तेव्हा त्यांनी अगदी लहान, गोलाकार असा पिझ्झा विकायला सुरुवात केली होती. दहा रुपयांत मिळणारा हा छोटासा पिझ्झा छान लागायचा. आम्ही अनेक वर्षं तो खाल्ला आहे. नंतर आमच्या ऑफिसच्या मागेच आझाद गणेश मंडळाच्या शेजारी सोमनाथ हा चहावाला आला. त्याचा चहा बासुंदीसारखा गोडमिट्ट असायचा. मात्र, आम्ही अनेकदा तिथं जायचो. हल्लीच अनेक वर्षांनी तिथं गेलो, तेव्हा हे दुकान व्यवस्थित एका टपरीत सुरू असलेलं दिसलं. अर्थात, चहाला ती चव नव्हती. ‘सकाळ’चं स्वत:चं कँटीन होतं. तिथले अण्णा आणि नंतर त्यांचा मुलगा हरीश यांचा परिचय ‘सकाळ’मध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला आणि काही ना काही निमित्तानं तिथं सतत येणं-जाणं असणाऱ्या बहुसंख्य वाचकांना माहितीच आहे. खरं तर हरीशचं कँटीन यावर स्वतंत्र पोस्ट होऊ शकेल. हे कँटीन आत्ताही सुरू आहे. त्या अवघ्या अर्ध्या किलोमीटरच्या त्रिज्येत तेव्हा माझं खाद्यजीवन हे असं होतं... त्या खाण्यावरच माझं तरुणपण पोसलं गेलं आहे. त्यामुळं या चवदार आठवणी शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहतील...


----


खाण्याचे गाणे - ६
----------------------


मी १९९९ मध्ये जर्नालिझमच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि मला डेक्कन जिमखान्यावरची खाद्यजत्रा खुली झाली. तोवर या भागात नियमित येणं व्हायचंच असं नाही. रानडे इन्स्टिट्यूटला प्रवेश घेतला तेव्हा मात्र इथली सगळी खाण्याची ठिकाणं सवयीची झाली. मी व मंदार (कुलकर्णी) ‘सकाळ’मध्ये काम करत होतोच. खिशात स्वकमाईचे पैसे खुळखुळत असायचे. त्यामुळं तो प्रश्न नव्हता. ‘रानडे’तलं रमेशचं कँटीन हाही अनेक पत्रकारांच्या जिव्हाळ्याचा विषय. आम्हीही त्यातलेच. तिथं वडापाव, समोशापासून ते सँडविचपर्यंत सगळं काही मिळायचं, पण मुख्य म्हणजे त्याच्याकडं ‘लिहून ठेवायची’ सोय होती. अर्थात मी कधीच ती वही वापरली नाही. पण बऱ्याच जणांचं खातं असायचं. बाहेर पडल्यावर डावीकडं आता जिथं मानकर डोसा आणि त्रिवेणी आहे त्याच्याशेजारी ‘जोशी वडेवाले’च्या जागेत एक मयुरा की मयुरी नावाचं हॉटेल होतं. आम्ही बरेचदा तिथं जायचो. त्याला एक छोटासा पोटमाळा होता. आमच्या वर्गातल्या सिगारेट ओढणाऱ्या मुलींची ती खास जागा होती. ‘त्रिवेणी’ तेव्हा रस्त्याच्या समोरच्या बाजूला, ‘रूपाली’शेजारी होतं. (आत्ताआत्तापर्यंत ते तिथं होतं.) तेव्हा ते टिपिकल अमृततुल्य होतं. दवे म्हणून मालक स्वत: चहा गाळत बसलेले असायचे. (हे ‘दारू गाळत’च्या धर्तीवर वाचावे.) सिद्धार्थ (केळकर), संतोष (देशपांडे), मी आणि मंदार अशी आमची चौकडी कायम तिथं चहाला जायची. सिद्धार्थला चहासोबत क्रीमरोल परमप्रिय. आम्हीही खायचोच. ‘रूपाली’ व ‘वैशाली’त तुलनेनं कमी जाणं व्हायचं. आज होते त्यापेक्षा कैकपट जास्त गर्दी तेव्हा ‘रूपाली’ला असे. तेव्हा ‘वाडेश्वर’ नव्हतंच. तिथं एक जुना बंगला होता बहुतेक. फूटपाथलगत एक लाकडी कुंपण होतं आणि आत झाडी वगैरे वाढलेली होती. तिकडं लक्षही जायचं नाही. ‘आर्यभूषण’च्या शेजारची खाऊ गल्ली तेव्हाही होती. मात्र, आता झालीय तशी बजबजपुरी नव्हती. मोजक्याच गाड्या असायच्या. पलीकडं ‘गुडलक’ होतंच; शिवाय समोर ‘लकी’ही तेव्हा चालू होतं. या दोन्ही ठिकाणी अधूनमधून जाऊन बनमस्का व चहा घेणं ही चैनीची परमावधी असायची. डेक्कनचा सब-वे आहे, त्याच्या पलीकडं ‘श्री उपाहारगृह’ (अपनाघर) होतं. अजूनही आहे. मी व संतोष तिथं कायम जायचो. मला तिथली साबुदाणी खिचडी आणि ताक विशेष आवडायचं. (आताही अधूनमधून जातो.) संतोषनं आणि मी आमचे जर्नालिझमचे सगळे शेवटचे पेपर इथं खिचडी खाऊन मग दिलेले आहेत.
प्रयाग हॉस्पिटलशेजारी आता जिथं ‘ड्रायफ्रूट हाऊस’ वगैरे दुकानं झाली आहेत, ती मोठी इमारत तेव्हा नव्हती. त्या कॉर्नरला ‘कॅफे सनराइज’ नावाचं छोटेखानी, पण टुमदार इराणी हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये नामवंत चित्रकारांची चित्रं टांगलेली असायची. आताचे प्रसिद्ध चित्रकार राजू सुतार यांची मी तिथं मुलाखत घेतल्याचं आठवतं. त्यांचीच चित्रं तेव्हा इथं डिस्प्ले केली होती. पलीकडं ‘खैबर’ नावाचा फेमस बार होता. आम्ही तिथं कधीच गेलो नाही; पण तो बार खूपच प्रसिद्ध होता तेव्हा! 
आताचा डेक्कन मॉल आहे, तिथं डेक्कन टॉकीज होती. या टॉकीजच्या शेजारी कलमाडींचं ‘पूना कॉफी हाउस’ हे प्रसिद्ध हॉटेल होतं. मी पॉलिटेक्निकला असताना आमचे उमराणी सर ‘फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट’साठी त्या काळात या हॉटेलमध्ये असलेल्या ऑटोमॅटिक हँड वॉश बेसिनचं उदाहरण द्यायचे. (खाली हात धरला, की आपोआप पाणी येतं...) आम्हाला भयंकर आश्चर्य वाटे. पण या महागड्या हॉटेलचा एकूण थाटमाट बघून तिथं जाण्याचं डेअरिंग कधी झालं नाही. (तिथंच शेजारी पहिल्या मजल्यावर पं. रोहिणी भाटेंची ‘नृत्यभारती’ होती.) समोरच निळूभाऊ लिमयेंचं ‘पूनम’ होतं. हा तेव्हा समाजवादी नेत्यांचा अड्डा असायचा. मी फार नंतर काही प्रेस कॉन्फरन्ससाठी तिथं गेलोय. पण तोवर ‘पूनम’चं ते ग्लॅमर ओसरलं होतं. बाकी डेक्कनवर खाण्याची चंगळ तेव्हाही होती. आता तर शतपटीने अधिक आहे.
मात्र, तारुण्यातल्या त्या खाण्याच्या आठवणींना तेव्हा असलेल्या सोबतीची नाजूक, हळवी जोड असल्यानं त्या आठवणी कायमच स्पेशल राहतील. सगळ्याच काही जाहीर सांगता येत नाहीत. त्या हृदयातच जपून ठेवायच्या...

----

(या मालिकेत मी गेल्या शतकातल्या म्हणजे १९९९ पर्यंतच्याच आठवणी लिहायचं ठरवलं होतं. त्यामुळं आता ही लेखमाला थांबवतो.)

....

(ता. क. 

बाकी, खाण्यासाठी जन्म आपुला, हे सत्य असल्यामुळं पुन्हा कधी तरी नव्या आठवणींसह पुन्हा नवे ‘खाण्याचे गाणे’ लिहीनच...)

--------

खाण्याचे गाणे - भाग १ ते ३

 खाण्याचे गाणे - १
----------------------


गेली २७ वर्षं, म्हणजे १९९७ पासून सलग पुण्यात राहतोय. त्याआधी १९९१ पासून तसा पुण्यात राहतोच आहे. मध्ये एक-दीड वर्षांचा गॅप पडला असेल तेवढाच. त्यामुळं आता जवळपास ३२-३३ वर्षांच्या आठवणी पुण्याशीच निगडित झाल्या आहेत. खाणं हा आपल्या सगळ्यांचा ‘जिव्हा’ळ्याचा विषय. तर आजपासून याच पुण्यातल्या खाण्याच्या काही आठवणी सांगण्यासाठी ही एक सदरसदृश पोस्टमालिका सुरू करतोय... खाण्याचे गाणे... 

-------

मी १९९१ मध्ये गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेतला तेव्हाचं पुणं बरंचसं आटोपशीर व टुमदार होतं. शिमला ऑफिस चौक ते कृषी महाविद्यालय चौकापर्यंत वडाची डेरेदार झाडं होती. मधे दुभाजकही नव्हता. तो कृषी महाविद्यालय चौकापासून सुरू व्हायचा. पिवळ्या सोडियम व्हेपरच्या दिव्यांनी हा रस्ता उजळून निघालेला असायचा. विद्यापीठ चौक तेव्हाही भलामोठा प्रशस्त होता. मध्ये एक गोलाकार, मोठं कारंजं होतं व ते सुरू असायचं. आम्ही संध्याकाळी बऱ्याच वेळा तिथं जायचो. तेव्हाच्या होस्टेली मुलांच्या भाषेत ‘चल, फाउंटनला जाऊ,’ असं म्हणायचो. तिथं वैभव नावाचं एक रेस्टॉरंट होतं. त्याच्या जरा पुढं एक बाई प्लास्टिकच्या टेबलवर रोज पोळी-भाजी विकायला बसायच्या. माझा संगमनेरचा मित्र सुमंत कुलकर्णी आणि मी कधी मेसचा कंटाळा आला, की या बाईंकडं जाऊन पोळीभाजी खायचो. पाच रुपयांत दोन पोळ्या, एक फळभाजी आणि सोबत कांदा-टोमॅटो एवढंच असायचं. पण सात्त्विक असायचं. मेसचं रद्दी जेवण जेवून कंटाळलेल्या आम्हाला ती पोळी-भाजी घरच्यासारखी लागायची.
याच चौकात पुढं पाषाणकडं जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या बाजूला चौपाटी भरायची. पुण्याला चायनीज खाण्याची सवय तिथल्या गाड्यांनी लावली. तिथं या चायनीजच्या गर्दीत एक ‘मिलाप पावभाजी’ म्हणून प्रसिद्ध गाडी होती. माझ्या आठवणीनुसार, तेव्हा २० रुपयांना तिथं पावभाजी मिळायची. अतिशय चविष्ट. अर्थात तेव्हा मेसला २५० रुपये महिना असा दर होता. त्यामुळं ही २० रुपयांची पावभाजी आम्हाला महागच वाटायची. त्यामुळं क्वचित कधी तरी खाल्ली जायची. आमच्या कॉलेजचं कँटीन होतं. तिथं एक रुपयात वडापाव व एक रुपयात चहा मिळायचा. रेंजहिल्स कॉर्नरला ‘रणजित टी स्टॉल’ असायचा. हा रणजित आमच्याच वयाचा किंवा थोडा मोठा असेल. त्याच्या गप्पिष्ट स्वभावामुळं तो कॉलेजच्या मुलांमध्ये फार लोकप्रिय होता. आमची त्याच्या गाडीवर कायम गर्दी असायची. इथंच पलीकडं ओम सुपर मार्केट चौकात ‘एचएनडी’ नावाची मेस होती. म्हणजे हिराचंद नेमीचंद दिगंबर जैन होस्टेलची मेस. तिची क्वालिटी चांगली होती आणि थोडी महागही होती. आमच्या होस्टेलची बरीचशी मुलं तिथं जायला धडपडायची. तिथं बाहेरची मुलं अलाउड नव्हती. पण काही तरी जुगाड करून, किंवा गेस्ट म्हणून आम्ही तिथं जेवायला जायचो. तिथं मारवाडी पद्धतीचं, कढी, पापड वगैरे असलेलं जेवण आमच्या मेसपेक्षा कैकपटीनं चांगलं होतं.
या सगळ्या खाण्यापेक्षा होस्टेलवर राहणाऱ्या मुलांच्या घरचा खाऊ यायचा तो खायला सगळ्यांच्या उड्या पडायच्या. असा डबा काही मिनिटांतच फस्त होत असे हे सांगायला नकोच.


---

खाण्याचे गाणे - २
---------------------

मी नगरहून कायमस्वरूपी पुण्यात आलो ते जुलै १९९७ मध्ये. तेव्हा मी ‘लोकसत्ता’च्या नगर आवृत्तीत काम करत होतो आणि आमचे गुरुजी सतीश कुलकर्णी यांच्या सांगण्यावरून पुण्यात बदली मागून घेतली होती. तेव्हा ‘लोकसत्ता’चं ऑफिस अरोरा टॉवर्सला होतं. मला राहायला भाऊमहाराज बोळातील ओक वाड्यात कॉट बेसिसवर जागा मिळाली. ‘लोकसत्ता’त तेव्हा नगर डेस्क पाहणारे विनायक लिमये उर्फ ‘विलि’ यांची मला त्यासाठी मोठी मदत झाली होती. मग मी शुक्रवार पेठेतून रोज सायकलीवरून अरोरा टॉवर्स ऑफिसमध्ये जायला लागलो. त्यापूर्वीही मी पुण्यात नेहमीच येत असलो आणि कॅम्प परिसरही पाहिला असला, तरी नोकरीसाठी या भागात येणं हे माझ्यासारख्या, नगरसारख्या लहान शहरातून आलेल्या मुलासाठी फारच ‘थ्रिलिंग’ वगैरे होतं. अरोरा टॉवर्सचा भाग मुंबईतील फोर्ट भागासारखा होता. (हे आत्ताचं आकलन अर्थात नंतर मुंबईत तो भाग नीट फिरून पाहिल्यावर झालं.) पुण्यातील इतर भागांपेक्षा हा भाग अधिक हाय-फाय आणि कॉस्मॉपॉलिटन होता, यात वाद नाही. पहिल्यांदा इराणी हॉटेलचा अनुभव घेतला तो इथं. डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून महात्मा गांधी रोड सुरू होतो. अरोरा टॉवर्सची इमारत संपली, की ईस्ट स्ट्रीटकडून येणाऱ्या रस्त्यामुळं तिथंच एक चौक तयार झाला आहे. याच चौकात ‘नाझ’ आणि ‘महानाझ’ ही दोन इराणी हॉटेलं होती. ही कायम गजबजलेली असायची. सिगारेटविरोधी सार्वत्रिक मोहीम नंतर सुरू झाली. त्याआधी बहुतेक हॉटेलांत सिगारेटचा धूर काढत अनेक लोक बसलेले असायचे. किंबहुना सिगारेट ओढायला निमित्त म्हणूनही काही जण या हॉटेलमध्ये यायचे. इथला इराणी चवीचा चहा मला आवडायचा. तिथं पट्टी समोसे मिळायचे, तेही भारी असायचे. यात कोबीच्या भाजीचं सारण भरलेलं असायचं आणि त्या गरमागरम समोशाचा तुकडा मोडला, की आतली भाजी जिभेला चांगलीच भाजायची. तो वेटर सात समोसे भरलेली प्लेट समोर आणून ठेवायचा. त्यातले आपल्याला हवे तेवढेच घ्यायचे असतात, हे ज्ञान मला लिमयेंनी दिलं. नंतर नंतर एकट्यानं तिथं जाऊन बसायचं धैर्य वाढलं. अरोरा टॉवर्सची जुनी, भलीमोठी लिफ्ट ऐतिहासिक होती. चौथ्या की पाचव्या मजल्यावर आमचं ऑफिस होतं. शेजारीच ‘इंडियन एक्स्प्रेस’चंही ऑफिस होतं. लिफ्टचं दार उघडलं, की समोर एक लांबच लांब आडवा कॉरिडॉर होता. डावीकडं गेलं, की आमचं ऑफिस आणि उजवीकडं एकदम कोपऱ्यात ‘इंडियन एक्स्प्रेस’चं ऑफिस होतं. मी चार वाजता ऑफिसला पोचायचो. ती चहाची वेळ असायची. तेव्हा ऑफिसतर्फे चहा यायचा. तो त्या कॉरिडॉरमध्ये मांडला जायचा. दोन्ही ऑफिसमधले बरेच सहकारी त्यामुळं त्या वेळेला कॉरिडॉरमध्येच असायचे. अनेक जण तेव्हा सिगारेट ओढायचे. त्या कॉरिडॉरमध्ये धूरच धूर झालेला असायचा. पुढं अनेक सिनेमांत, मालिकांत वृत्तपत्र कार्यालयाचं जे टिपिकल दृश्य दाखवलं जायचं, त्याच्या फार जवळ जाणारं हे दृश्य होतं. चहा घ्यायचा आणि मगच कामाला सुरुवात करायची. मग दोन तासांनी सहा वाजता पुन्हा खाली उतरायचं आणि ‘नाझ’ किंवा ‘महानाझ’मध्ये जाऊन इराणी चहा आणि पट्टी समोसे खायचे.
मी त्या ऑफिसला फार काळ नव्हतो. अवघा दीड महिना मी तिथं काम केलं. त्यामुळं कॅम्पचं वैशिष्ट्य असलेली ‘मार्झ-ओ-रिन’ किंवा ‘कयानी’ किंवा ‘मोना फूड्स’ यांचं दर्शन त्या वेळी घेता आलं नाही. ते घडलं, पण नंतर! तेव्हा कॅम्पमध्ये नेहरू मेमोरियल हॉलकडून कमिशनर ऑफिसकडं जाताना डाव्या बाजूला फूटपाथवर एक उसाच्या रसाचं दुकान होतं. तिथला जम्बो ग्लास तेव्हा फार फेमस होता. तो एक रुपयाला मिळायचा. म्हणजे अन्यत्रही रस एक रुपयालाच होता; पण यांचा ग्लास जवळपास दुप्पट मोठा होता. त्यामुळं एक रुपयात दोन ग्लास रस प्यायल्याचा आनंद मिळायचा. तेव्हा तिथं तुफान गर्दी असायची हे आठवतंय. कमिशनर ऑफिसच्या पुढं चौपाटी होती. आताही आहे, पण जरा तिथून हलली आहे. या चौपाटीवरही काही वेळा खायला जाणं व्हायचं. नंतर खूप प्रसिद्ध झालेला 'गार्डन वडापाव' इथलाच. आज तो परिसर बराच बदलला आहे. ‘लोकसत्ता’चं ऑफिसही तिथं नाही. मागं असलेलं ‘वेस्ट एंड’ थिएटरही बंद पडलं. मात्र, कधी तरी त्या भागात चक्कर झाली, की ‘मार्झ-ओ-रिन’च्या चटणी सँडविचसोबत या आठवणी खायला छान लागतात...

-----

खाण्याचे गाणे - ३
---------------------

मी १९९७ मध्ये पुण्यात आलो, तेव्हा भाऊमहाराज बोळातील ओक वाड्यात राहत होतो. मी तिथं सहा वर्षं राहिलो. पुण्याच्या अगदी हृदयस्थानी असलेल्या या भागात राहत असल्यानं तिथल्या खाण्याच्या आठवणी या बऱ्याच ‘ओरिजनल’, ‘पेठकर’ अशा जुन्या पुणेकरांच्या आठवणींसारख्याच आहेत. मी सुरुवातीला आमच्या वाड्यासमोर असलेल्या अपार्टमेंटमध्ये जहागीरदार यांच्याकडं जेवायला जायचो. अगदी घरगुती अशी मेस होती. ते दोघंही फार प्रेमळ होते. आम्ही अनेक क्रिकेट सामने त्यांच्या घरी पाहिले आहेत. आम्ही एवढा आगाऊपणा करायचो, पण काका शांत असायचे. त्यांच्याच घरात, आम्हाला मॅच हवी असेल तर मॅच लावा, असा आदेश सोडायचो. (१९९८ मधल्या सचिनच्या त्या 'डेझर्ट स्टॉर्म' म्हणून नंतर प्रसिद्ध झालेल्या झंझावाती इनिंग्ज आम्ही इथंच आरडाओरडा करत बघितल्या होत्या‌...) त्यांच्याच घरात, आम्ही सोफ्यावर बसायचो आणि काका कोपऱ्यात कुठं तरी बसलेले असायचे. आम्ही ‘बसा ना काका’ असं त्यांनाच म्हणायचो. काकूंच्या हाताला चव होती. साधंच, पण रुचकर जेवण असायचं. नंतर काही काळानं त्यांनी हा व्यवसाय बंद केला. मग मी शनिपारासमोर गंजीवालेंच्या ‘शुभकामना इडली सेंटर’मध्ये जायला लागलो. तिथल्या काकू माहेरच्या ब्रह्मेच निघाल्या. गंजीवाले काका दिसायला धिप्पाड, मोठ्या मिशा असे होते. पण अतिशय प्रेमळ. या काका-काकूंनी माझ्यावर फार प्रेम केलं. विशेषत: काकूंसाठी मी ‘माहेरचा माणूस’ होतो. त्यामुळं बरेचदा वरून त्यांच्या घरी केलेली भाजी खास माझ्यासाठी वाटीतून खाली यायची. वर ताकाचा एखादा ग्लास असायचाच. या कुटुंबाकडं तुळशीबागेतल्या राम मंदिरात रामजन्माच्या वेळी पाळणा हलविण्याचा वंशपरंपरागत मान आहे. त्या वेळी रामाच्या पागोट्याचा धागा घ्यायला तिथं एकच झुंबड उडायची. मला गेली कित्येक वर्षं हा धागा विनासायास मिळत आलेला आहे. मी ती जागा आणि मेस सोडून एवढी वर्षं झाली, तरी राम नवमीच्या दुसऱ्या दिवशी काका-काकू आजही माझी वाट पाहत असतात आणि मी एखादा अपवाद वगळता दर वर्षी त्यांच्याकडं जात आलोय.

त्या परिसरात खाण्याची भरपूर चंगळ होती. ‘इंद्रायणी’ व ‘मुरलीधर’चा रस, ‘अनोखा’मधले समोसे आणि डोसे, ‘श्रीकृष्ण’ची मिसळ, ‘श्री’ची मिसळ, बाजीराव रोडवरची 'वाडेश्वर'ची (मूळ स्थान) इडली व अतिशय सुंदर अशी चटणी (ही कायम लवकर, म्हणजे एका इडलीत संपायची आणि जादा वाटीला चार्ज असायचा... भाव्यांनी बहुतेक पुढचा सगळा विस्तार याच जोरावर केला असावा 😀), ‘स्वीटहोम’मधली खिचडी, ‘रोनक’ पावभाजीच्या दारात सकाळी विकायला असलेले पोहे व वडा, थोडं पुढं ‘संतोष’, तुळशीबागेतलं कावरे आइस्क्रीम, आरोग्य मंदिर, लक्ष्मी रस्त्यावरचं पूना गेस्ट होऊस, जोगेश्वरी बोळातली खाऊ गल्ली या सर्व ठिकाणी आमचा संचार असायचा. नंतर मंडईकडून बदामी हौदाकडं जाणाऱ्या रस्त्यावर साखरे महाराज मठाच्या अलीकडं ‘पुणेरी’ नावाचं हॉटेल सुरू झालं होतं. तिथले ‘अण्णा’ आमच्या ओळखीचे झाले होते. तिथली साबुदाणा खिचडी आणि शेंगदाण्याची उसळ घातलेली उपवासाची मिसळ हे पदार्थ खास होते. एरवी पोहे, उपमा तर असायचाच. आमच्या ओक वाड्यासमोरच अंबिका अमृततुल्य होतं. कित्येकदा ते दुकान उघडून तो पहिला चहा रस्त्यावर ओतायच्या वेळी मी आणि माझा मित्र योगेश जोगळेकर त्या ‘अमृततुल्य’मध्ये हजर असायचो. याशिवाय मंडईत बुरुड गल्लीच्या बाजूनं रामेश्वर चौकाकडं जायला लागलं, की कांबळे यांचं अमृततुल्य होतं. यांचा चहा म्हणजे अगदी ‘पिव्वर दुधाचा बासुंदी चहा’. मला तेव्हा तो चहा अतिशय आवडायचा. अनेकदा दोन दोन कप प्यायचो. अलीकडं मंडई मेट्रो स्टेशनला जायचा योग आला, तेव्हा तो सगळाच परिसर एवढा बदललेला दिसला, की मला धक्काच बसला. माझ्या चेहऱ्यावर बहुदा हरवल्यागत भाव आले असावेत. ते बघून खरोखरच एक माणूस मला म्हणाला, ‘दगडूशेठ का? असं इकडून जा...’ मला अस्सा राग आला... मी म्हटलं, मी इथलाच आहे; मला माहितीय सगळं... पण नंतर मनात म्हटलं, मला जिथं जायचंय त्या जागा आता आहेत कुठं इथं...?

-----

(बाकी मंडईतलं व स्वारगेट-शिवाजीनगरचं आमचं रात्रीचं खाद्यजीवन आणि एकूणच ‘मंडई विद्यापीठ’ हा स्वतंत्र पोस्टचा विषय आहे. त्याविषयी पुढच्या भागात...)

----

भाग ४ ते ६ वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

---------