27 Apr 2023

गोवा ट्रिप १५-१९ एप्रिल २३ - उत्तरार्ध

लोभस हा ‘गोवालोक’ हवा...
--------------------------------


गोव्यात आलो आहे आणि बा. भ. बोरकरांची आठवण आली नाही, असं शक्यच नाही. कोलवा बीचवरच्या त्या संध्याकाळचा सुंदर सूर्यास्त बघत असताना, ‘माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या-कपाऱ्यांमधुन घट फुटती दुधाचे; माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या-फणसांची रास, फुली फळांचे पाझर, फळी फुलांचे सुवास’ या ओळी आठवल्याच. त्या बीचवर सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या सगळ्या जीवांची अवस्था बोरकरांच्याच शब्दांत ‘सुखानेही असा जीव कासावीस’ अशीच झाली असणार, यात शंका नाही.
आमच्या पोरांना तिथं तिथं वॉटर स्पोर्ट, ते पॅरासेलिंग करायचं होतं. मात्र, सूर्यास्तानंतर तिथं एक पोलिसांची गाडी आली आणि त्यांनी सगळ्यांना रास्तपणे पाण्याबाहेर काढलं. मग आम्हीही दुसऱ्या दिवशी परत येऊ, असं म्हणत तिथून निघालो. तिथं बाहेर आलो, की एक ‘सागरकिनारा’ नावाचं उडुपी हॉटेल होतं. पोरांना काही तरी खायचं होतंच. मग मंदार सगळ्या मुलांना घेऊन तिथं गेला. आम्ही तिथल्या बाहेरच्या दुकानांत शॉपिंग करत हिंडत राहिलो. तिथून आमच्या व्हिलाला परत जायचं कसं, हा एक प्रश्नच होता. तिथं रिक्षा किंवा टॅक्सी फारशा दिसत नव्हत्या. आपल्याकडे शहरात कसं, नऊ-साडेनऊ वाजले तरी फार काही उशीर झालाय असं वाटत नाही. तिथं मात्र लगेच सामसूम व्हायला सुरुवात होते. बीचच्या अगदी जवळचा परिसर तेवढा दुकानांमुळं जागता होता. आम्ही काजू वगैरे आवश्यक खरेदी करून टाकली. पोरांचं खाणं झाल्यावर आम्ही टॅक्सी शोधायला लागलो. सुदैवानं फार वाट बघावी लागली नाही. लगेच दोन टॅक्सी मिळाल्या आणि आम्ही पहिल्या दिवशी सुखरूप आमच्या व्हिलावर पोचलो. रात्रीचं जेवण तिथंच सांगितलं होतं. फार भूक नव्हती, तरी डाल-राइस सगळ्यांनीच खाल्ला. नंतर यजमानांकडून अत्यंत उत्कृष्ट असं होममेड आंबा आइस्क्रीम मिळालं आणि दिवसभराचा शीण पळून गेला. नंतर निवांत गप्पा मारत बसलो. पहिल्या दिवशीच्या शिणवट्यामुळं लगेच झोप लागली.
दुसऱ्या दिवशी मंदार, अभिजित व सगळे बेतालबाटिमच्या, हां - ‘वेताळभाटी’च्या - बीचवर गेले. हा बीच तुलनेनं जवळ, म्हणजे दोन किलोमीटरवर होता. आम्ही तिघं मात्र उशिरापर्यंत झोपलोच होतो. त्यामुळं गेलो नाही. तसंही समुद्राच्या पाण्यात खेळायचा आम्हाला फार सोस नाहीच. जवळपास तीन तासांनी हे सगळे भरपूर खेळून परत आले, तेव्हा जवळपास दहा वाजले होते. तोवर आमचं सगळं आवरून झालं होतं. आज ब्रेकफास्टला पोहे, फळं आणि नंतर चहा-कॉफी असं होतं. ब्रेकफास्ट झाल्यानंतर सकाळी समुद्रात खेळून दमलेली मंडळी विश्रांतीला गेली. त्यामुळं आम्हीही जरा निवांतच होतो. मि. गोडबोले बाहेरगावी गेले होते, ते आज सकाळी परत आलेले दिसले. त्यांच्याशी ओळख झाली. त्यांच्याकडे टाइम्स ऑफ इंडिया व लोकमत हे दोन पेपर येत असल्यानं माझी सोय झाली. आम्ही खरं तर पणजीला एक दिवस जायचा विचार काल केला होता. मात्र, काल पेपरमध्ये कळलं होतं, की पणजीत १७ ते १९ एप्रिल या काळात जी-२० ची परिषद भरते आहे. त्यामुळं तिथं बऱ्यापैकी बंदोबस्त असणार होता. पर्यटनस्थळं खुली असतील की नाही, याची कल्पना नव्हती. म्हणून मनस्विनीला फोन लावला. ती मसुरीत होती. मात्र, तिनं तिकडून फोनाफोनी करून सांगितलं, की स्ट्रीट मार्केट वगैरे सगळं बंद ठेवलं आहे. मांडवी नदीतील क्रूझ पण रविवारी बंद होत्या. पण आज, म्हणजे सोमवारी त्या चालू असतील. पण आम्ही राहत होतो, तिथून दोन टॅक्सी करून पणजीला केवळ त्या क्रूझसाठी जाणं काही व्यावहारिक नव्हतं. शिवाय गोव्यात अन्य वेळी बाकी सर्व ठिकाणं तशी बघून झालीच होती. अगदी दहा वर्षांपूर्वी आम्ही सगळ्यांनी ती क्रूझ राइड केलीच होती. या वेळी जरा निवांतपणा हवा होता. म्हणून पण पणजीला जाणं सर्वानुमते रद्दच केलं. दुपारचं जेवण ‘कोटा कोझिन्हा’मध्ये करायचं हे ठरलंच होतं. मग दुपारी परत तिकडं गेलो. रस्त्यातच मालकीणबाई दिसल्या. कुणाच्या तरी दुचाकीवरून कुठे तरी निघाल्या होत्या. ‘आलेच’ या टाइपचं काही तरी बोलल्या आणि भुर्र निघून गेल्या. आज गर्दी कमी होती. त्यामुळं आज आतमध्ये बसायला मिळालं. मुख्य जेवण सोडल्यास आज कालचीच ऑर्डर ‘रिपीट’ होती. थोड्या वेळातच मालकीणबाई परत आल्या आणि पुन्हा आमची सरबराई करू लागल्या. त्यांच्या ‘व्यवसायचातुर्याला’ यश आलं आणि कालच्यापेक्षा आज बिल थोडं जास्तच आलं! भरपेट जेवण झाल्यावर फोटोसेशनही झालं. इथून आम्हाला ते ‘बिग फूट म्युझियम’ बघायला जायचं होतं. टॅक्सी लवकर मिळेना. पण अखेर दोन टॅक्सी बुक झाल्या व आम्ही त्या संग्रहालयाकडे रवाना झालो. मडगाव शहरावरून आम्ही लोटली या ठिकाणी गेलो. अंतर आठ किलोमीटर असलं, तरी इथं ते नेहमीच जास्त वाटलं. तसंच आत्ता येतानाही वाटलं. 

हे ‘बिग फूट संग्रहालय’ म्हणजे कुणा एका महात्म्याचं (नाव विसरलो) उमटलेलं मोठं पाऊल. त्यावरून हे नाव दिलंय. त्या महात्म्याची गोष्ट सांगणारा एक व्हिडिओही तिथं दाखवतात. ते मोठं पाऊलही तिथं जतन करून ठेवलंय. तिथं चर्चप्रमाणे उदबत्त्या वगैरे लावतात. त्या बाहेर विकायलाही होत्या. हे संग्रहालय म्हणजे आपल्याकडे पंढरपूरला कैकाडी महाराज मठ किंवा कोल्हापूरजवळचा कण्हेरी मठ किंवा हाडशीमधलं संग्रहालय आहे, तसंच आहे. प्राचीन काळापासूनचा गोव्याचा इतिहास तिथं मांडला आहे. पुतळे चांगले होते. फोटो काढायला भरपूर संधी होत्या. तिथं दोन छोटी दुकानंही होती. तिथल्या संभाषणचतुर बायकांमुळे आम्ही तिथंही भेटवस्तूंची खरेदी केलीच. जवळपास तासभर तिथं गेला. मग बाहेर येऊन सरबत प्यायलो तेव्हा बरं वाटलं. आमचे टॅक्सीवाले तिथंच थांबले होते. (ते तसे थांबणार याचा अंदाज होताच.) मग त्यांनी आम्हाला कोलवा बीचला सोडलं. काल राहिलेलं पॅरासेलिंग आज करायचंच होतं. मंदार, नील, निमिष, सेतू या चौघांनी एकापाठोपाठ एक पॅरासेलिंग केलं. आम्ही आपलं खालून त्यांचं शूटिंग केलं. (मी व धनश्रीनं फार पूर्वी दिवेआगरला केलं होतं. तेव्हा मंदार फॅमिलीसोबत गेलो होतो.) नील ते करून आल्यावर फारच ‘एक्साइट’ झाला होता. मजा आली. आज सोमवार असल्यानं बीचवर कालच्या तुलनेत गर्दीही कमी होती. आम्ही निवांत बसलो मग! सूर्यास्त झाल्यावर निघालो. आजही तिथं बाहेरच्या दुकानांत शॉपिंग केलं. विशेषत: आमच्या दोन छोट्या जुळ्या पुतण्या-पुतणीला खास ते ‘आय लव्ह गोवा’ वगैरे लिहिलेले ड्रेस घेतले. तिथं एक उसाचा रस विकणारा गाडा होता. तो रस प्यायल्यावर मस्त वाटलं. नंतर आम्ही सगळेच ‘सागरकिनारा’ला गेलो. सँडविच, डोसे, चहा असं सगळं हादडून बाहेर पडलो. टॅक्सी मिळायला फार त्रास झाला नाही. मग लगेच व्हिलावर परतलो. आजही जेवण तिथंच सांगितलं होतं. निवांत रात्रीचं जेवण झालं. रात्री परत गप्पा, पत्ते यात कसा वेळ गेला कळलंही नाही.
तिसऱ्या दिवशी सकाळी ही सगळी मंडळी पुन्हा ‘वेताळभाटी’च्या बीचवर जाणार होती. फक्त अभिजित थांबणार होता, कारण त्याचं काही काम बाकी राहिलं होतं. मग आम्ही लवकर आवरून सगळेच बाहेर पडलो. श्वानमंडळी आमच्या स्वागताला प्रत्येक घराबाहेर उभी होतीच. त्यांच्या भुभुकाराच्या गजरात आम्ही त्या बीचवर पोचलो. बीच अगदीच काही जवळ नव्हता. आम्ही पोचेपर्यंत आठ वाजले होते. सगळे जण पाण्यात खेळले. मी व धनश्री बीचवरच थांबलो. थोड्या वेळानं नीलही कंटाळला. मग आम्ही तिथं जरा आधी तिथून निघालो. हातात काठी घेऊन दोन किलोमीटर परत चालत आलो. सकाळची वेळ असली तरी ऊन व दमट हवेमुळं चांगलीच दमछाक झाली. आल्यावर शॉवर घेणं मस्टच होतं. बाकी मंडळी जरा वेळानं परत आली. मग एकत्र ब्रेकफास्टला जमलो. आज ब्रेकफास्टला उपमा होता. मि. गोडबोलेंनी त्यांच्या अंगणातल्या काजूच्या मोठ्या झाडाचे काजू बोंड काढून ते कापून आम्हाला खायला दिले. मी पहिल्यांदाच खाल्ले. रसाळ, आंबटतुरट अशी वेगळीच चव होती.
आज आमचा निघायचा दिवस होता. ‘चेकआउट’ची वेळ दहा असली, तरी आमची ट्रेन दुपारी असल्यानं आम्हाला बारा वाजेपर्यंत थांबायला परवानगी मिळाली होती. सगळं आवरून होईपर्यंत बारा वाजलेच. दुपारच्या जेवणाचा प्रश्न होता. ‘कोटा कोझिन्हा’ मंगळवारी बंद असतं. मग गोडबोलेंनी आम्हाला तिथं असलेलं ‘फिश्का’ हे दुसरं हॉटेल सुचवलं. आम्ही सामान तिथंच ठेवून जेवून यावं, मग टॅक्सी बोलवावी असं त्यांनी सांगितलं. हे आम्हाला सोयिस्कर होतं. मग पुन्हा एकदा आमची वरात चालत चालत (कुत्र्यांचा सामना करत, हे आता सांगायला नको!) ‘फिश्का’ हॉटेलमध्ये पोचली. ते हॉटेल उघडं असलं, तरी तिथं अक्षरश: एकही ग्राहक नव्हता. आम्हीच आधी पोचणारे. पण निवांत, साग्रसंगीत जेवण झालं. हे हॉटेल ‘कोटा’पेक्षा थोडंसं महागही होतं. पण वेळेला जेवण मिळालं, हे काय कमी म्हणून आम्ही पुन्हा पदयात्रा करत व्हिलावर आलो.
आता निघायची वेळ झाली होती. नेहमीप्रमाणे दोन टॅक्सी बुक केल्या. एक टॅक्सी पुढं गेली. दुसऱ्या टॅक्सीत अभिजित, निमिष, मी, धनश्री व नील जाणार होतो. अभिजितनं बुक केलेली टॅक्सी आली. मात्र, त्यानं आल्या आल्या ‘फक्त चार प्रवासी नेणार, तुम्ही पाच जण आहात,’ असा पवित्रा घेतला. आम्ही बुचकळ्यात. गेले दोन दिवस आम्ही बाकी सगळ्या टॅक्सींतून पाच जणच गेलो होतो. त्यात आमच्यात दोन तशी लहान मुलं होती. गोडबोले दाम्पत्यानंही बाहेर येऊन मध्यस्थी केली. मात्र, तो टॅक्सीवाला काही हटेना. बाहेर पोलिसांनी पकडलं, तर जबाबदारी कोण घेणार, असं सारखं विचारत होता. माझ्या डोक्यात एकदम ट्यूब पेटली. याचं व पोलिसांचंच साटंलोटं असणार. हा बाहेर नेऊन पोलिसांसमोर गाडी उभी करणार. आम्हाला दोन किंवा तीन हजारांचा दंड पोलिस लावणार. त्यात याचा वाटा असणार! मी ताडकन आमच्या बॅगा काढून घेतल्या व त्याला म्हटलं, आप चले जाओ. हमें नहीं चाहिए आप की टॅक्सी! त्यावर तो भाई जरासा आश्चर्यचकितच झाला. त्याला ही प्रतिक्रिया अपेक्षित नसावी. मग जरा तणतणतच तो निघून गेला. आम्ही दुसऱ्या टॅक्सीच्या शोधाला लागलो. रविवारी आम्हाला सोडणाऱ्या टॅक्सीवाल्याचा नंबर माझ्याकडे होता. त्याला फोन लावला. तो मराठी होता. लगेच येतो म्हणाला. मी पैसे विचारले. ‘पाचशे’ असं तो म्हणाला. (किंवा मला तसं ऐकू आलं...) मी लगेच ये म्हटलं. आमचे यजमान खूप चांगले होते. टॅक्सी मिळाली नाही, तर मी तुम्हाला गाडीने स्टेशनला सोडतो, असं मि. गोडबोलेंनी सांगितलं होतं. त्यामुळं आम्ही तसे निर्धास्त होतो. आमची ट्रेन साडेतीन वाजता होती. अखेर दोन चाळीसला मी फोन केलेला टॅक्सीवाला उगवला. आम्ही लगेच सामान टाकलं आणि निघालो. त्यानं आडवाटेनं, कुठून कुठून पळवत तीन वाजून पाच मिनिटांनी मडगाव स्टेशनला गाडी आणली. पाचशे रुपये दिले, तर ‘आठशे’ झाले म्हणाला. मला तरी तो आधी फोनवर ‘पाचशे’च म्हणाल्याचं आठवत होतं. मग आता पर्याय नव्हता. अडचणीच्या वेळी तो आला होता, हे खरं होतं. त्यामुळं आम्ही फार वाद न घालता त्याला आठशे रुपये देऊन टाकले.

स्टेशनमध्ये मंदार व बाकी सगळे आमची वाटच पाहत होते. थोड्याच वेळात ट्रेन आली आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. ट्रेन फक्त अर्ध्या तासापूर्वी वास्कोतून सुटल्यामुळे आता इथं स्वच्छता होती. आमच्यातले तीन नंबर एकदम वेगळ्याच डब्यात (तीन डबे सोडून) आले होते. मग अभिजित, हर्षदा व निमिष तिकडं गेले. आम्ही सहा जण पहिल्या डब्यात बसलो. अर्थात सगळे डबे जोडलेले असल्यानं आम्ही ये-जा करतच होतो. गोवा एक्स्प्रेस ही दक्षिण-पश्चिम रेल्वेकडून चालविली जाते. या विभागाचं मुख्यालय आहे हुबळी. आत्ता गाडी त्या हद्दीतूनच जात असल्यामुळं इथं तैनात एकदम जोरदार होती. एक इन्स्पेक्टर बाई गाडीतून सिंगल प्रवासी असलेल्या महिलांची चौकशी करून गेल्या, तेव्हा तर मला भरूनच आलं. बाकी सतत झाडलोट, स्वच्छता हे सुरू होतं. या वेळचे बेडशीट, ब्लॅंकेट आदीही जरा बरे होते. सतत खायला येत होतं. मग आम्ही भेळ खाल्ली. नंतर घाट सुरू झाला, तर आम्ही पुन्हा दाराशी जाऊन उभे राहिलो. पण ‘दूधसागर’ कधी गेला ते कळलंच नाही. ही गाडी लोंडा नावाच्या जंक्शनला बराच वेळ थांबते. इंजिन पुढचे काढून मागे जोडले जाते. प्रवासाची दिशा बदलते. पूर्वी हुबळीवरून निजामुद्दीनला जाणारे दोन डबेही याच स्टेशनात या गाडीला जोडले जायचे. आताही जोडले जातात का माहिती नाही. आमची गाडी या स्टेशनवर थांबल्यावर आम्ही निवांत खाली उतरून फोटो वगैरे काढले. अर्ध्या तासानं गाडी बेळगावच्या दिशेनं हलली. हळूहळू रात्र झाली. गाडी साडेसात वाजता बेळगावात पोचणार होती. मला बेळगावला जाऊन आता २३-२४ वर्षं झाली. मला ते मस्त गाव पुन्हा बघायचं होतं. मी पुन्हा दारात येऊन थांबलो. सुंदर थंड हवा होती. एसीपेक्षा बरं वाटत होतं. आकाश निरभ्र होतं. सगळे ग्रह, तारे दिसत होते. मुलांना ते आकाशदर्शन घडवलं. हळूहळू गाडी बेळगावच्या हद्दीत शिरत होती. सर्व शहर आता संध्याकाळच्या दिव्यांनी झगमगत होतं. बेळगाव आलं, की ‘रावसाहेबां’ची आठवण येणं अपरिहार्य होतं. त्यांचं ते रिट्झ थिएटर, आर्ट सर्कल, ते राणी पार्वती कॉलेज इथंच कुठे तरी असणार... मी आत्ताच्या त्या आधुनिक, झगमगीत शहरात साठ सालचं बेळगाव शोधायचा निरर्थक प्रयत्न करत होतो. बेळगाव म्हटलं, की आणखी लंपनची आठवणही होणारच. अगदी एक हजार नऊशे अडुसष्ट वेळा... तंतोतत! (आमचा निपुण ‘लंपन’ आता पडद्यावर आणतोय. फार उत्सुकता आहे तो बघायची...)
बेळगाव स्टेशनात गाडी थांबली. स्टेशनही चकाचक होतं. एकदाच जाऊनही मी या गावाच्या प्रेमात आहे. त्यामुळं बेळगाव सोडून गाडी पुढं निघाली तसं उगाच हुरहुर वाटायला लागली. मग घटप्रभा, रायबाग, कुडची वगैरे स्टेशनं घेत मिरजला, म्हणजे महाराष्ट्रात आली. इथं आलं की आपण ‘आपल्या एरिया’त आलो, असा फील येतोच. अर्थात याही वेळी खाली उतरलो नाही. रात्री ट्रेनमधलं जेवण घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मग ते मागवून जेवलो आणि झोपलो सरळ! पहाटे पावणेचारचा गजर जवळपास प्रत्येकानं लावला होता. पुण्याला बरेच लोक उतरणार असल्यानं त्या सुमारास बरीच जाग आली गाडीला. गाडी अगदी वेळेत म्हणजे पहाटे सव्वाचारला पुण्यात पोचली.
ओला-उबरची टॅक्सी बुक करायला लागलो तर एकही टॅक्सी आत येईना. आतल्या रिक्षावाल्यांची दादागिरी! ते या ओला-उबरवाल्यांकडून अनधिकृतपणे ५० रुपये वसूल करतात. खंडणीच ही! मग आम्ही बाहेर जाऊन एक कॅब बुक केली. तोही शहाणा. केलेलं बुकिंग रद्द करा आणि ते पैसे मला द्या, म्हणायला लागला. ‘अडला हरी...’ या न्यायाने आम्ही ‘बरं बाबा, सोड एकदाचं आम्हाला घरी’ असं म्हणालो आणि पुढच्या पाऊण तासात घरी पोचलो. घरी पोचल्यावर आपल्या बेडवर पाठ टेकवून पडल्यावर जे सुख झालंय म्हणता, त्याची कुठं तुलनाच नाही! 
अर्थात तीन-चार दिवसांचा ‘जिवाचा गोवा’ केल्यावर हा गारवा येणारच होता. पुन:पुन्हा गेल्या चार दिवसांतली स्मरणचित्रं डोळ्यांसमोरून सरकत होती आणि आवडत्या बाकीबाब यांच्या ओळीही स्मरत होत्या - 

स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा
तृप्ति नको मज मुक्ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा

---

(समाप्त)

---

याआधीच्या गोवा ट्रिपवरचा ब्लॉग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-----

26 Apr 2023

गोवा ट्रिप १५-१९ एप्रिल २३ - पूर्वार्ध

गोवा... आनंदाचा ठेवा...
-----------------------------------------------------


ऐन एप्रिलमध्ये, रणरणत्या उन्हात गोव्याला जाण्यामागं माझं तसंच सबळ कारण होतं. मी गोव्याला पहिल्यांदा गेलो, ते २००३ मध्ये हनीमूनला. आमचं लग्न झालं २५ मार्च २००३ ला आणि मी व धनश्री त्यानंतर चार-पाच दिवसांनी नगरवरून गोवा एक्स्प्रेसने गोव्याला गेलो होतो. त्यानंतर दहा वर्षांनी, म्हणजे फेब्रुवारी २०१३ मध्ये आम्ही पुन्हा गोव्याला जायचं ठरवलं, तेव्हा पेंढारकर व मंदार फॅमिली आम्हाला जॉइन झाली. आमची मुलं तेव्हा बरीच लहान, म्हणजे ८-१० वर्षांची होती. तेव्हा आम्ही कळंगुटला ‘कामत हॉलिडे होम्स’मध्येच (जिथं दहा वर्षांपूर्वी आम्ही राहिलो होतो, तिथंच) राहिलो. या ट्रिपला आम्हाला फारच धमाल आली होती. म्हणून मग बरोबर दहा वर्षांनी पुन्हा गोव्याला जायचं ठरवलं आणि स्वाभाविकच हाच सीझन निवडावा लागला. मागच्या दोन्ही वेळी गोवा एक्स्प्रेसनं गेलो होतो, म्हणून या वेळीही मुद्दाम चार महिने आधी (मुलांच्या परीक्षा संपल्यानंतरच्या) ट्रिपच्या तारखा फायनल केल्या आणि ट्रेनची तिकिटं काढली.
आम्ही मडगावपर्यंत जाणार होतो, त्यामुळं त्या शहराच्या आसपास कुठं होम स्टे मिळतोय का, हे आम्ही शोधायला लागलो. आमची मैत्रीण मनस्विनी (प्रभुणे) ही आमची गोव्याची ‘सिंगल पॉइंट काँटॅक्ट पर्सन’ आहे. त्यामुळं तिलाच साकडं घातलं. तिच्या ओळखीतून बाणवलीतील ‘अगस्त्य व्हिला’ची माहिती समजली. मूळ पुण्यातल्याच गोडबोले दाम्पत्याची ही प्रॉपर्टी आहे. मी प्रणाली गोडबोले यांना फोन केला, तर त्यांनी आमच्या तारखांना बुकिंग फुल्ल असल्याचं (गोड बोलून) सांगितलं. मी फारच निराश झालो. याचं कारण त्यांचा हा व्हिला मडगाव स्टेशनपासून फक्त आठ किलोमीटरवर होता. आमच्याकडं स्वत:च्या गाड्या नव्हत्या आणि आम्ही एकूण दहा लोक होतो. त्यामुळं दर वेळी टॅक्सी करावी लागणार होती. म्हणून अंतराचा विचार करावाच लागणार होता. मला काय वाटलं, माहिती नाही; पण मी पुन्हा गोडबोले बाईंना फोन केला आणि म्हटलं, बघा की, काही जमतंय का! एक-दोन दिवसांत त्यांचा उलट मेसेज आला, की आधी ज्यांनी बुकिंग केलं होतं, त्यांना विनंती केली की एक आठवडा पुढं ढकलता येईल का? आणि ते लोक तयार झाले, तर तुम्हाला बुकिंग मिळू शकेल. व्वा व्वा! मला फारच आनंद झाला. आम्ही लगेच त्यांच्याकडं बुकिंग करून टाकलं. 
गोवा एक्स्प्रेस ही गाडी माझी फार आवडती. एके काळी या गाडीचा फार दिमाख होता. आम्ही जर्नालिझमचे विद्यार्थी म्हणून दिल्ली ट्रिपला गेलो होतो ते याच गाडीनं. ही गाडी पुण्यात फार ऑड वेळेला, म्हणजे पहाटे सव्वाचार वाजता येते. मला आठवतंय, आम्ही सर्व विद्यार्थी रात्री बारा वाजताच स्टेशनवर पोचलो होतो आणि ही ट्रेन येईपर्यंत भयंकर दंगा केला होता तिथं. अतिच उत्साह होता अंगात... वर उल्लेख आला आहे, तसं वीस वर्षांपूर्वी हनीमूनला गेलो होतो ते याच ट्रेननं. तेव्हा ही गाडी प्रीमियम सुपरफास्ट श्रेणीत होती आणि अजिबात लेट नसायची. डबे व इतर व्यवस्थाही स्वच्छ, नेटकी असायची. गोव्याला जाण्यासाठी ही गाडी पुण्यात दुपारी पाच वाजता येते. हल्ली ॲपमुळं गाडी किती लेट आहे वगैरे ते नेमकं कळतं. आम्ही निघायच्या दिवशी ही गाडी एक ते दीड तास लेट पुण्यात येत आहे, असं दिसत होतं. अर्थात तरी आम्ही गाडीच्या वेळेला म्हणजे पाच वाजताच पुणे स्टेशनला येऊन पोचलो. गाडी अपेक्षेप्रमाणे लेट होती. सात वाजता येणार होती. मग एसी वेटिंगरूममध्ये (तासाला माणशी दहा रुपये दर) जाऊन बसलो. स्वाभाविकच पोरांना व पोरांच्या बापांना भुका लागल्या. मग स्टेशनवरच पाकीट हलकं व्हायला सुरुवात झाली. अर्थात एकदा ट्रिपला जायचं व मजा करायची म्हटल्यावर पैशांचा विचार करायचा नसतो. ‘होऊ दे खर्च’ हाच बाणा ठेवायचा असतो. अखेर सात वाजता ट्रेन आली. गाडीला भरपूर गर्दी होती. गाडीची पूर्वीची शान गेल्याचं जाणवलं. ‘थ्री टिअर एसी’त आमचे बर्थ होते. तिथं रिझर्वेशन असलेलेच लोक बसू शकतात, त्यामुळे गर्दी असली तरी निदान त्रास नव्हता. बुकिंग करताना सर्व दहा सीट एकत्र कधीच मिळत नाहीत. याचं कारण बुकिंग करताना जास्तीत जास्त सहा जणांचं एकत्र बुकिंग करता येतं. पुढची चार तिकिटं वेगळी बुक करावी लागतात. तोवर मधल्या सीट बुक झालेल्या असतात. त्यामुळं डब्यात शिरल्यावर प्रत्येक जण दुसऱ्याबरोबर हा सीट अदलाबदलीचा उद्योग करत असतो. आम्हीही तो केला आणि एकदाचे स्थिरस्थावर झालो. ट्रेनमधलं जेवण हा एक भयावह प्रकार असतो. त्यामुळं आम्ही जेवण घरूनच आणलं होतं. गप्पा, पत्ते, जेवणखाण यात भराभर वेळ गेला. रात्रीचे नऊ वाजले, की ट्रेनमधल्या खालच्या सीटवर बसलेल्या लोकांना एकदम इसाळ येतो. ते धाडधाड बर्थ पाडून झोपायच्या तयारीला लागतात. अशा वेळी आपल्याला इलाजच नसतो. आम्हीही गपगार आपापल्या बर्थवर जाऊन पडलो. मधला बर्थ लावणे, त्यावर त्या बेडशीट घालणे, इष्ट ब्लँकेट मिळविणे हा एक सोहळा असतो. तो सगळ्यांचा पार पडला. त्यात पोरांना अचानक बर्थ बदलावेसे वाटतात. कुणाला पंखा सुरू हवा असतो, तर कुणाला बंद! कुणाला दिवा हवा असतो, तर कुणाला गुडुप्प अंधार! रेल्वेच्या त्या एका विशिष्ट लयीत सतत आपलं अंग हलत असतं. एकूणच मला हे सगळं फार मस्त वाटतं. त्यात कुठल्या तरी स्टेशनला गाडी थांबली, की त्या स्टेशनला आपले पाय लागलेच पाहिजेत, अशा अहमहमिकेनं खाली उतरणारे महात्मे असतात. मीही एके काळी तसाच होतो. आता ते उद्योग फार करत नाही. तरी खालच्या खिडकीतून बाहेर बघण्याचा खटाटोप सुरूच असतो. आपण झोपेची आराधना सुरू केली, की खालचे घोरासुर एकसुरात घोरायला लागतात. मी इतके ट्रेन प्रवास केले, पण आपल्या कंपार्टमेंटमध्ये घोरणारा माणूस नाही, असं एकदाही झालेलं नाही. ट्रेनच्या आवाजाच्या वरताण आवाजात हे घोरासुर ढाराढूर झोपेत घोरत असतात आणि आपल्याला घोर लावत असतात. अशा वेळी सरळ इअरफोन कानात खुपसायचे आणि आपली आवडती मालिका बघायची. मी ‘वागले की दुनिया’चा एपिसोड बघून टाकला आणि घोरासुरांना पराजित केलं. नंतर अशी एक वेळ येते, की आपल्याला झोप लागतेच.... तसाच मीही झोपेच्या स्वाधीन झालो.
सकाळी जाग आली, तेव्हा गाडी अजून कॅसलरॉक आणि दूधसागर स्टेशनांच्या मधेच होती. पहाटे ५.४० ही गाडीची मडगावला पोचण्याची नियोजित वेळ. मात्र, पुण्यापासून झालेला विलंब कायम होता आणि आता ही गाडी सकाळी आठ वाजता मडगावला पोचणार होती. आम्हाला हे एका अर्थानं सोयीचंच होतं. भल्या पहाटे मडगावला उतरून तरी काय करायचं होतं? मग डब्याच्या दारात येऊन उभा राहिलो. हा घाट उतरताना दोन्ही बाजूंना सह्याद्रीचं विलोभनीय दर्शन घडतं. ‘दूधसागर’ धबधब्याचंही दर्शन घडलं. अगदी थोडासा का होईना, पण वाहता धबधबा होता. चालत्या ट्रेनमधूनही फोटो चांगला मिळाला. गाडी घाटाखाली आली आणि वातावरणातला बदल एकदम जाणवू लागला. दमट हवा आणि ऊन हे कॉम्बिनेशन बेकार होतं. सकाळी बरोबर आठ वाजता मडगाव स्टेशनवर पोचलो. आता आम्हाला टॅक्सी करूनच बाणवलीला जायचं होतं. तिथं एक बरं होतं. प्री-पेड टॅक्सी स्टँड होतं. तिथं आम्ही टॅक्सी बुक केल्या आणि निघालो. तिथंही घासाघीस करून शंभर रुपये कमी करायला लावले. पण एकूणच गोव्यात टॅक्सी महाग. प्रणाली गोडबोलेंना फोन केल्यावर कळलं, की त्यांचा व्हिला बाणवलीत नव्हे, तर ‘बेतालबाटिम’मध्ये आहे. बेतालबाटिम म्हणजे मूळचं नाव वेताळभाटी. पण गोव्यात पोर्तुगीजांनी सर्व देशी नावांची, पुढे ‘म’ लावून वाटम् लावूनम् टाकलीम् आहेम्. बाणवलीचं काय तर म्हणे बेनोलिम... त्यामुळं मूळ मराठी किंवा गोवन नावं शोधणं हे एक दिव्यच. ते एक असो. 
मडगाव स्टेशनपासून आमचा व्हिला आठ किलोमीटर असला तरी मध्ये निर्जन भाग लागत असल्याने आपण लांब कुठं तरी जातोय असं वाटत राहतं. तसं ‘बराच लांब प्रवास करून’ एकदाचे आम्ही आमच्या ‘अगस्त्य व्हिला’त दाखल झालो. तिथं गोडबोले बाईंसह त्यांच्या स्कॉट, कोको आणि एंजल या तीन कुत्र्यांनीही आमचं ‘भुभुकारा’सह स्वागत केलं. मी आणि धनश्री एकूणच प्राण्यांपासून दूर राहणारे! याबाबत ‘पाळीव प्राणी’मध्ये पु. लं.नी सांगितलेलं मत अगदी पटतं. पण आमच्यातले निमिष आणि शुभवी हे भलतेच प्राणीप्रेमी. ते आल्या आल्या या श्वानकुलाच्या गळ्यातच पडले. आमची चिंता मिटली. (मात्र, पुढच्या वेळी व्हिला बुक करताना तिथं ही जमात आहे का, याची आधी चौकशी करायला हवी, हे मनात ठरवून टाकलं.) बाकी हा व्हिला उत्तम आहे. पोर्तुगीज शैलीतलं त्याचं बांधकाम अतिशय आकर्षक आहे. आमच्या खोल्याही प्रशस्त होत्या. खाली दोन व वरच्या मजल्यावर दोन. आम्ही कुत्र्यांचा विचार न करता, खालची खोली घेतली. खोल्या एसी असल्यानं बाहेरच्या उकाड्याचा त्रास नव्हता. तिन्ही दिवस ब्रेकफास्टची सोय तिथंच होती. पहिल्याच दिवशी गोडबोलेंनी आम्हाला भाजी-पाव, मंगळुरी बन्स असा गोवन ब्रेकफास्ट दिला. आम्ही त्यावर अगदी तुटून पडलो. मग तिथंच एकत्र गप्पा मारत बसलो. दुपारच्या जेवणासाठी जवळच ‘कोटा कोझिन्हा’ नावाचं हॉटेल होतं. तिथं सगळे गेलो. या हॉटेलच्या गोवन मालकीणबाई फारच भारी होत्या. त्यांनी आमच्याजवळ येऊन प्रत्येकाला हे ट्राय करा, ते ट्राय करा असं सांगितलं. रविवार असल्यानं हॉटेलात गर्दी होती. पण आम्ही दहा जण असल्यानं अंगणात आमच्यासाठी वेगळं टेबल लावण्यात आलं. दुपारची उन्हाची वेळ असल्यानं आम्ही सगळ्यांनीच शरीर थंड करणारी विविध पेयं घेतली. आमच्यातले बहुसंख्य शाकाहारी. ते जेवण तिथं नीट मिळतंय की नाही, याची जरा शंका होती. पण उत्तम पंजाबी व्हेज जेवण मिळालं. मुळात स्टार्टर आणि पेयपानातच आम्ही ‘गार’ झालो होतो. एकूण मजा आली. हॉटेल मालकीणबाईंच्या बिझनेस स्मार्टनेसवर आम्ही खूशच झालो. आम्ही राहत होतो, तो भाग अगदी ग्रामीण आणि भलताच शांत होता. इतका, की आम्ही रस्त्यानं जाताना आमच्याच गप्पांचा आवाज सगळ्यांत मोठा यायचा. तरी खिदळतच आम्ही परत आमच्या व्हिलावर आलो. 

संध्याकाळी, इथून जवळ असलेल्या व दक्षिण गोव्यातल्या प्रमुख असलेल्या कोलवा बीचवर जायचं ठरवलं. इथं टॅक्सी वा रिक्षा मिळायची मारामार. मग गोडबोले बाईंनी त्यांच्या ओळखीचा रिक्षावाला बोलावला. सुदैवानं तो यायला तयार झाला. मग त्यानं दोन फेऱ्या मारून आम्हाला बीचवर सोडलं. पहिली तुकडी पुढं गेली असताना आपण रस्त्यानं जरा चालत जाऊ म्हणून आम्ही निम्मी जनता बाहेर पडलो. आमच्यासोबत गोडबोले बाईही त्यांच्या तीन कुत्र्यांना घेऊन बाहेर पडल्या. आम्हाला मुख्य रस्त्याला लागेपर्यंत जरा आतल्या, निर्जन रस्त्यानं जायचं होतं. तेव्हा एकदम दोन-तीन घरांतील आठ-दहा कुत्री भुंकत बाहेर आली. ‘हातात काठी ठेवा’ हा मंत्र गोडबोले बाईंनी दिलाच होता. तो आणि रामरक्षा असं दोन्ही जपत कसेबसे त्या रस्त्यातून पुढे आलो. या परिसरात एवढी शांतता होती, की आमच्यासारखी दोन-चार माणसं तिथून जाणं हीदेखील त्या कुत्र्यांसाठी ‘दिवाळी’ असणार! मग त्यांनी यथेच्छ भुंकून ती साजरी केली. पुढं केल्यावर एक जवळपास गवाच दिसणारा महाकाय रेडा दिसला. नशीब, जाड दोरानं तो बांधून ठेवला होता. अखेर आम्ही त्या मुख्य रस्त्यावर आलो आणि ‘हुश्श’ केलं. लवकरच आमचे रिक्षावाले भाऊ आले आणि त्यांनी दहा मिनिटांत आम्हाला कोलवा बीचला सोडलं. तिथपर्यंतचा रस्ता मात्र अतीव सुरेख, टिपिकल गोव्यातल्या रस्त्यासारखा देखणा होता. दोन्ही बाजूंनी गर्द झाडी, छोटासा पण अजिबात खड्डे नसलेला, पांढरे पट्टे मारलेला रस्ता, मधूनच लागणारं एखादं चर्च... असा तो सुशेगाद गोवा बघूनच मन तृप्त झालं. अर्थात कोलवा बीच आला आणि गर्दी दिसू लागली. त्या बीचवर टिपिकल बीचवर असते तसंच ‘क्राउड’ होतं. मात्र, अगदी तुफान गर्दीही नव्हती. स्वच्छ हवा होती आणि थंडगार वारं सुटलं होतं. कोलव्याला पांढरी रेती आहे. लवकरच सूर्य मावळतीकडं निघाला. हे दृश्य आपण जगाच्या पाठीवर कुठंही, कितीही वेळा टक लावून बघू शकतो, नाही का! माझीही त्या धुंद वातावरणात, त्या गर्दीतही काही क्षण समाधी लागली. धनश्रीला व मला, दोघांनाही पाण्यात खेळायला फार आवडत नाही. आम्ही तोवर आमचा सेल्फी काढून घेतला. २००३, २०१३ आणि आता २०२३! गोव्यातल्या बीचवरच्या फोटोंची अशीही हॅटट्रिक! ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असं वाटून गेलं...
बीचवरची ती संध्याकाळ फार सुंदर होती. आपलं कुटुंब, आपले जिवाभावाचे मित्र, त्यांचं कुटुंब, आमची पोरं असे आम्ही सगळे एकत्र ती मजा लुटत होतो. अशा वेळी बोलायचं नसतंच काही... आम्ही मनानं सगळे ‘इन सिंक’ होतो. सोबत होतो. हे क्षण तुमच्या जगण्यातले अमूल्य क्षण असतात. ते मावळत्या सूर्यासोबत भराभर अस्तंगत होत असतात. त्यांना मनाच्या कॅनव्हासवरच कोरून ठेवायचं असतं. बाकी जगणं वाळूसारखं हातातून निसटून गेलं, की आयुष्याच्या संध्याकाळी फक्त तो रंगलेला कॅनव्हास डोळे बंद करून बघत बसायचा असतो. ही सहल, हा खटाटोप, हे एकत्र फिरणं, एकत्र प्रवास करणं, एकत्र जेवणं, एकत्र मजा करणं हे सगळं त्यासाठीच होतं. आपण आपल्यातच असण्याचे हे खास दिवस! कोलवा बीचवरची संध्याकाळ ही अशीच कायम मन:पटलावर कोरलेली राहील...

(पूर्वार्ध)


उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
........



                                                                                                                                                     

----------------------------------------

10 Apr 2023

मुंबई ट्रिप ९-४-२३

‘जिओ’ जी भर के...
-----------------------


एखाद्या ठिकाणी नवं काही झालं, की ते (शक्य असेल तर अर्थात) तातडीने बघावं, असं मला वाटतं. मला नव्या गोष्टींविषयी सतत कुतूहल असतं. शिवाय आपल्याकडे एखादं ठिकाण नवं असताना जितकं चांगलं, आकर्षक असेल तितकं ते नंतर राहीलच असं नाही. मुंबईला सागरी सेतू बांधून तयार झाला, तेव्हा केवळ तो बघायला मी सहकुटुंब मुंबईला गेलो होतो. ही गोष्ट आहे २००९ मधली. त्यानंतर अशी बरीच ठिकाणं एक्स्प्लोअर केली. उदा. हाडशीचं विठ्ठल मंदिर. अगदी अलीकडं २०१८ मध्ये बडोद्याजवळ ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ तयार झाल्यावर लगेच मी सहकुटुंब भेट दिली होती. मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (लोकप्रिय नाव - बीकेसी) भलं मोठं जिओ कन्व्हेन्शन सेंटर उभं राहतं आहे, ही बातमी मला कळली तेव्हापासून मला त्या ठिकाणाविषयी उत्सुकता वाटत आली आहे. अगदी गेल्या महिन्यात अखेर हे केंद्र तयार झालं आणि त्याला ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ (एनएमएसीसी) असं नाव दिलंय, असं समजलं. (स्वत:चंच नाव दिलं म्हणून आधी नाक मुरडून झालं...) पण जन्मजात कुतूहलापोटी जरा ‘गुगल’ करून या केंद्राची माहिती घेतली. त्यात तिथं ‘द ग्रेट इंडियन म्युझिकल : सिव्हिलायझेशन टु नेशन’ अशा लांबलचक नावाचा एक कार्यक्रम सादर होणार आहे हे समजलं. तिथल्या ग्रँड थिएटरविषयी वाचलं होतंच. परदेशांत - न्यूयॉर्कमध्ये किंवा लंडनमध्ये - अशा ब्रॉडवे पद्धतीच्या नाटकांच्या किंवा सांगीतिक कार्यक्रमांच्या भव्य सादरीकरणाविषयी ऐकून माहिती होतं. तसा एखादा कार्यक्रम आयुष्यात एकदा तरी बघायला मिळावा, हे केव्हापासूनचं सुप्त मनातलं सुप्तच स्वप्न होतं. या कार्यक्रमाच्या जाहिरातीमुळं आणि त्यातल्या ग्रँड थिएटरच्या वर्णनामुळं हे स्वप्न अचानक पूर्ण झालं. मी १५ मार्चला सहज ‘बुक माय शो’वर या कार्यक्रमाची माहिती बघत होतो. तेव्हा बरीचशी तिकिटं विकली गेल्याचं दिसलं. मी सहज ९ एप्रिलचं तिकीट काढू या असा विचार केला आणि मला तीन तिकिटं मिळालीही! (नंतर कळलं, की हा शो २३ एप्रिलपर्यंत आहे, पण आता सगळीच तिकिटं विकली गेली आहेत.)
सर्वप्रथम हे सांगायला पाहिजे, की हे केंद्र म्हणजे एक सार्वजनिक ठिकाण आहे. ते अर्थातच सर्वांना खुलं आहे. तेथील कार्यक्रमांना आपण ‘बालगंधर्व’ किंवा ‘गणेश कला-क्रीडा मंचा’त जसं तिकिटं काढून जातो, तसं जाता येतं. त्या सेंटरच्या वेबसाइटवर किंवा ‘बुक माय शो’वर कार्यक्रम व तिकिटांची माहिती मिळते. (सेंटरच्या वेबसाइटवर आपण रजिस्ट्रेशन केलं, तर त्यांच्या आगामी कार्यक्रमांच्या सर्व मेल आपल्याला येतात.) या देखण्या, भव्य सेंटरमध्ये तीन सभागृहं आहेत. सर्वांत मोठं म्हणजे ग्रँड थिएटर. हे नावाप्रमाणेच मोठ्ठं आहे. यात दोन हजार प्रेक्षक बसू शकतील, अशी व्यवस्था आहे. अत्याधुनिक सुविधा असलेलं हे थिएटर परदेशातील कुठल्याही अशा थिएटरपेक्षा कमी नसावं. याशिवाय ‘द स्टुडिओ’ नावाचं २५० प्रेक्षकक्षमतेचं आणखी एक सभागृह आहे, तर ‘द क्युब’ नावाचं १५० प्रेक्षकक्षमतेचा समीप रंगमंच इथं आहे. (यातल्या ‘द स्टुडिओ’त शनिवारीच ‘प्रिय भाई, एक कविता हवी आहे...’ या माझ्या अतिशय लाडक्या कार्यक्रमाचा प्रयोग झाला, हे कळल्यावर आनंद वाटला.) ही सभागृहं अर्थातच (तिकीट काढलं असेल तर) सर्वांना खुली आहेत. आपण आपले स्वत:चे कार्यक्रमही तिथं करू शकतो. (किंबहुना करायला हवेत.)
आम्ही (म्हणजे धनश्री, नील व मी) रविवारी (९ एप्रिल) दुपारी एक वाजता पुण्यातून निघालो. पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर कधीही गेलात तरी कायम ट्रॅफिक असतं. त्यात अनेकदा जॅमही लागतो. त्यात अडकायचं नसेल तर जाण्या-येण्याच्या वेळा ‘ऑड’ ठेवाव्या लागतात. कुठला दिवस आहे, रविवार किंवा लाँग वीकएंड वगैरे फार अभ्यास करावा लागतो. मी नेहमीप्रमाणे तो सगळा करूनच ठेवला होता. त्यामुळं जनरली, रविवारी जेवून लोक झोपतात, त्या वेळी, म्हणजे एक वाजता आम्ही घराबाहेर पडलो. स्वाभाविकच आम्ही कुठेही अडथळा न येता पावणेपाच वाजता बीकेसीत, अगदी ‘एनएमएसीसी’त पोचलो. अर्थात फूड मॉलला एक स्टॉप झालाच. तिथं कायमच गर्दी असते. खाण्यासाठी वेटिंग असतं. मला हे असलं अजिबात आवडत नाही. पण इलाज नव्हता. मग ती महागामोलाची पोटपूजा आटोपून आम्ही एकदाचे पुढं निघालो. तो अर्धा तास वजा केला तर आम्ही बरोबर सव्वातीन तासांत पोचलो होतो. पनवेल संपल्यावर नेहमीप्रमाणे वाहनांची गर्दी सुरू झाली. तरी वाहतूक हलत होती. एका जागेवर थांबावं लागलं नाही. मुंबईत एप्रिल किंवा मेमध्ये प्रचंड उकाडा असतो. त्यामुळं आपली गाडी घेऊन जाणं इष्ट. निदान कारमधल्या एसीमुळे ‘जिवाची होतिया काहिली’चे एपिसोड टळतात. नवी मुंबईपासून पुढं एक रस्ता ठाण्याकडं जातो आणि एक डावीकडं मुंबईला. इथं वास्तविक तसे मोठे व ठळक बोर्ड हवेत. इथं थोडी गडबड होते. अर्थात शेवटी मी योग्य मार्ग धरला. वाशीच्या खाडी पुलावर नेहमीच प्रचंड गर्दी असते. इथं वाहतूक अगदी मंद चालली होती. मानखुर्दला आता मानखुर्द ते घाटकोपर नवा फ्लायओव्हर झाल्याने बीकेसीकडे जायचा वेळ बराच वाचतो. पूर्वी मला वाटतं, सायन, चुनाभट्टीकडून वांद्रे परिसराकडे जावं लागायचं. नव्या फ्लायओव्हरमुळे आम्ही लवकर पोचू असं वाटलं. पण पुढे एका ठिकाणी फ्लायओव्हरवर जाण्याऐवजी खालून पुढे आलो. मग जरा वळसा पडला. तरी आम्ही ४.४५ वाजता बीकेसीत पोचलो. मी बीकेसीचं वर्णन ऐकून होतो, मात्र प्रत्यक्षात तिथं जाण्याचा योग कधी आला नव्हता. त्या फ्लायओव्हरवरून बीकेसीची स्कायलाइन भारी दिसत होती. जणू परदेशात आलोय असंच वाटतं. उंच उंच देखण्या, काचेच्या इमारती, आखीव-रेखीव रस्ते... सगळंच लय भारी! गुगलताईंच्या मदतीनं लगेचच सेंटरपाशी पोचलो. ११ नंबरच्या गेटमधून कार पार्किंगकडे एंट्री आहे. तिथं आपल्याकडे मॉलमध्ये शिरताना होते तशीच सगळी तपासणी झाली. तळघरात चार मजले भरतील एवढं, दोन हजार कार मावतील एवढं प्रचंड पार्किंग आहे. आम्हाला पी-२ म्हणजे वरून खालच्या दिशेने दुसऱ्या मजल्यावर पार्किंग मिळालं. गाडी लावल्यावर तिथल्या पोरानं त्या पिलरचा फोटो काढून घ्या, असं सांगितलं. ते योग्यच होतं, कारण गाडी कुठं लावलीय हे परत आल्यावर तिथं शोधणं कर्मकठीण. लिफ्टमधून वर आलो, तर एका हसतमुख युवतीनं आमचं स्वागत केलं. ‘तुम्ही गल्ली चुकला आहात’ हे तिच्या चेहऱ्यावर जवळपास वाचता येत होतं. तेच तिनं गोड आंग्ल भाषेत सांगितलं. वर मधल्या वेळात तुम्ही काय काय बघू शकता, हेही सांगितलं. तिथं ‘संगम’ नावाचं एक कलाप्रदर्शन भरलं होतं. मात्र, त्याचं तिकीट खालच्या मजल्यावरून काढून आणायचं होतं. आम्ही खाली उतरलो. हा तळमजला म्हणजे या सेंटरचं मुख्य प्रवेशद्वार होतं. आम्ही पोचलो तेव्हा अगदी पाच वाजत होते, त्यामुळं तुरळक गर्दी होती. ती नंतरच्या दोन तासांत बऱ्यापैकी वाढली. आम्ही तो तळमजला बघत हिंडू लागलो. तिथं भारतीय संस्कृतीचं प्रतीक असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचे स्टॉल होते. बाजूला इन्स्टॉलेशन्स होती, भिंतीवर भव्य पेंटिंग्ज होती. एकूण सगळा प्रकार एकदम उच्च होता. सगळा परिसर सेंट्रली एसी असल्यामुळं उकाड्याचा प्रश्न मिटला होता. जागोजागी खाण्याचे स्टॉल, बसायला जागा, अत्यंत लखलखीत अशा वॉशरूम, तिथंही अपंग व्यक्तींसाठी विशेष व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर आणि बॅटरी ऑपरेटेड गाड्या... थोडक्यात, प्रगत देशांत अशा सेंटरमध्ये ज्या ज्या सुविधा असतील, त्या सर्व इथं पुरवण्यात आल्या होत्या. आम्हाला भूक लागली होती, म्हणून समोसा आणि चहा-कॉफी घेतली. दर महाग असले, तरी आपल्याकडच्या मॉल, मल्टिप्लेक्ससारखेच होते. दोन छोटे समोसे ८० रुपयांना, तर चहा व कॉफी प्रत्येकी ६० रुपयांना होती. अर्थात फूडमॉलमधले दर यांहून जास्त होते, त्यामुळं आम्हाला हे ठीकच वाटले. जागोजागी हात सॅनिटाइझ करण्याची व्यवस्था होती आणि डस्टबीनही होत्या. मग आम्हाला एकदम त्या कलाप्रदर्शनाच्या तिकिटांची आठवण झाली. त्या बॉक्स ऑफिसवर विचारलं, तर आजची तिकिटं संपल्याचं तिथल्या (हसतमुख) युवतीनं सांगितलं. थोडक्यात, ते प्रदर्शन बघायचं राहिलं. मग आम्ही खालीच टाइमपास करत बसलो. भरपूर फोटो काढले. तिथं बनारसी साड्यांचं दालन होतं. तिथं एक वृद्ध विणकर आजोबा स्वत: त्या हातमागावर साडी विणण्याचं काम करत होते. पैठणीचं दालन होतं. त्यावर मराठी नावं होती. (या सेंटरमध्ये एक गोष्ट मात्र खटकली. सगळीकडं इंग्रजी व हिंदी पाट्या होत्या. आता देवनागरी म्हणजेच मराठी असं अनेकांना वाटत असल्यानं कुणाला त्यात काही खटकत नसावं. मात्र, मला वाटलं, की व्यवस्थित मराठी पाट्याही तिथं हव्या होत्या.) बाकी एक राजस्थानी चित्रकार होता. एक ओडिशातला पट्टचित्र काढणारा कलाकार होता. एक काश्मिरी शाली विणणारे गृहस्थ होते. लोक कुतूहलानं तिथं जात होते. ती कला बघत होते. मात्र, विक्रीसाठी असलेल्या वस्तू काहीच्या काही महाग होत्या. (उदा. एका शालीची किंमत होती ८६ हजार ९०० रुपये) आम्ही अशा ठिकाणी दुरूनच नमस्कार करून पुढं जात होतो. एका ठिकाणी एक अंध व्यक्ती मेणबत्ती आणि मेणाच्या वस्तू तयार करत होती. त्या वस्तू मात्र सुंदर होत्या. अर्थात त्या खरेदी करून नंतर पडून राहतात. म्हणून आम्ही काहीच घेतलं नाही.
संध्याकाळी त्या सेंटरच्या बाहेर एक मोठं रंगीत फाउंटन सुरू करतात. त्यालाही तिकीट होतं म्हणे. चौकशी केली तर तेही अपेक्षेप्रमाणे ‘सोल्ड आउट’ होतं. वास्तविक आम्ही जिथं बसलो होतो, तिथून काचेतूनही ते दिसणारच होतं. अनेक लोक ते सुरू होण्याच्या अपेक्षेनं काचेसमोरच्या जागा पकडून बसले. आम्ही तिथंच बसलो होतो. मात्र, आमच्या ‘शो’ची वेळ साडेसात होती आणि आम्हाला सव्वासातला निघावंच लागलं. थोडक्यात, फाउंटन शो राहिला. (पुढच्या वेळेला आता कलाप्रदर्शन आणि फाउंटन...) आम्ही जिन्यानं वरच्या मजल्यावर गेलो. तिथं ड्रेस सर्कलचे प्रवेश होते. आम्हाला अजून एक मजला वर जावं लागणार होतं. मग लिफ्टनं वर गेलो. इथं आमच्या लोअर बाल्कनीचे प्रवेश सुरू होते. पाच मिनिटांतच तिथल्या रांगेतून आम्ही त्या ‘ग्रँड थिएटर’मध्ये शिरलो.
आत शिरल्या शिरल्या ते भव्य आणि देखणं सभागृह बघून एकदम ‘अहा’ असं झालं. नीट बसल्यावर लक्षात आलं, की या बाल्कनीची उंची बरीच आहे. शिवाय लोअर बाल्कनी व अप्पर बाल्कनी यातल्या रांगा सगळ्या एकापाठोपाठ एक अशाच होत्या. फक्त वरच्या काही रांगांना अप्पर बाल्कनी म्हटलं होतं आणि आम्ही बसलो होतो त्या पुढच्या रांगांना लोअर... त्यापेक्षा ड्रेस सर्कलची जागा खाली, पण रंगमंच उंचावरून दिसेल अशी नेमकी होती. पुढच्या वेळेला ड्रेस सर्कलचं तिकीट काढायचं हे ठरवून टाकलं. थिएटर भव्य होतं, दोन्ही बाजूला ते बॉक्स वगैरे होते. पण मला नंतर जरा ते थोडं छोटं वाटलं. म्हणजे याहून भव्य असू शकलं असतं असं वाटून गेलं. मुख्य रंगमंचावर एक भव्य डिजिटल पडदा होता. या पडद्याचा वापर नंतर त्या शोमध्ये महत्त्वाचा होता. ‘शो’विषयी फार काही माहिती नव्हतं. त्यामुळं पाटी कोरी होती. फिरोझ अब्बास खान यांनी हा शो दिग्दर्शित केला आहे आणि अजय-अतुल यांचं संगीत आहे, हे माहिती होतं. शोला अमिताभ बच्चन यांच्या आवाजातलं निवेदन होतं. पडद्यावर काही ओळी यायच्या. उदा. गीतेतलं वचन. मग त्यावर अमिताभ यांचं भाष्य... मग तो डिजिटल पडदा वर जायचा आणि समोर भव्य रंगमंचावर नृत्य सादर व्हायचं. सुरुवातच ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची’ या आपल्या आरतीने झाली. गणेशाची एक भव्य मूर्ती वरून खाली आली आणि एकदम दोनशे-तीनशे नृत्य कलाकार त्या भव्य मंचावर येऊन आरतीवर नृत्य करू लागले. ते दृश्य प्रेक्षणीय होतं. शेवटी अगदी ‘घालीन लोटांगण, वंदीन चरण...’ वगैरे जोरदार झालं. माझ्या डोळ्यांतून नकळत पाणी झरलं ते ऐकताना... प्रेक्षकांनीही मस्त ताल धरला होता. एकूण जोरदार सुरुवात झाली. अमिताभच्या धीरगंभीर आवाजामुळं त्या कार्यक्रमाला एक अभिजात रूप प्राप्त झालं होतं. खाली पिटात हंगेरी की ऑस्ट्रियाचा लाइव्ह ऑर्केस्ट्रा आणून बसवला होता. सभागृहाचं ॲकॉस्टिक्स उत्तम होतं. आवाज घुमत नव्हता. खणखणीत येत होता. नंतर रामायण-महाभारतापासून विविध धर्मांचं आगमन, उत्पत्ती, विचार आणि त्यावर आधारित साजेसं नृत्य किंवा गाणी असं सादर होत गेलं. प्रियांका बर्वेनं ‘कानडा राजा पंढरीचा’ अतिशय सुंदर म्हटलं. (कलाकारांत ती एकच तेवढी ओळखू आली...) एकूण कार्यक्रम चांगला रंगला. शेवटी भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत आला आणि राष्ट्रगीत होऊन ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली. मग जोरदार ‘कर्टन कॉल’ही झाला. शेवटी नीता अंबानी यांची ध्वनिमुद्रित चित्रफीत बघावी लागली. त्यात त्यांनी हे सेंटर उभे करण्यामागची त्यांची भूमिका मांडली. त्यातलं ‘हे केंद्र देशाला समर्पित केलं आहे आणि इथं केवळ महानगरांतीलच नव्हे, तर छोट्या शहरांतील, अगदी सुदूर गावांतील कलाकारांनी येऊन आपली कला सादर करावी, अशी आमची इच्छा आहे,’  हे वाक्य ठळक महत्त्वाचं. हा हेतू किती पूर्ण होतो, हे भविष्यकाळात कळेलच.
कार्यक्रम संपल्यावर वॉशरूम आणि लिफ्ट दोन्हींकडं झुंबड उडाली. मात्र, मुंबईचे लोक शिस्तीचे आहेत. पुलंनी म्हटल्याप्रमाणे, तीन इंग्रज एकत्र आले, की लाइन लावतात, तद्वत इथेही सर्वांनी शांततेत रांगा लावून आपला कार्यभाग उरकला. पार्किंगमध्ये आलो. दुपारीच दूरदृष्टीनं घेऊन ठेवलेली सँडविचेस गाडीत बसल्या बसल्या फस्त केली आणि लगेचच निघालो. (सेंटरच्या समोरच्या बाजूने फोटो काढायचा राहिला, हे नंतर लक्षात आलं. असो. पुढच्या वेळी!) गुगलताईंच्या मदतीनं पनवेलच्या मार्गाला लागलो. रविवारची रात्र असल्यानं मुंबईकडून पुण्याला या वेळी वाहतूक कमी असेल असा अंदाज होता. तसंच झालं. अजिबात ट्रॅफिक जॅम न लागता, सुरळीत आलो. फूड मॉलला पोटपूजेसाठी थांबावं लागलं, तेवढा वेळ फक्त मध्ये खर्च झाला. बाकी बरोबर एक वाजता घराच्या पार्किंगमध्ये होतो. 
दमल्यामुळं लगेच झोप लागली. मात्र, स्वप्नातही तो भव्य रंगमंच आणि तिथले रंगबिरंगी नृत्य गिरक्या घेत येत राहिले. ‘जिओ’ जी भर के म्हणत...!

---

(अधिक माहितीसाठी http://nmacc.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.) 

----

याआधीच्या मुंबई ट्रिपचा ब्लॉग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

---