20 Oct 2015

राजवाडे अँड सन्स

'पेढी'जात संघर्ष
-------------------

राजवाडे अँड सन्स हा सचिन कुंडलकरचा नवा मराठी सिनेमा पाहताना सर्वांत जास्त कोणती गोष्ट अपील होत असेल, तर ते या सिनेमाचं तारुण्य. हा सिनेमा तरुण आहे, आजचा आहे, आजच्या मुलांचा आहे... त्यांची भाषा बोलतो. त्यांच्या नजरेतून जग दाखवतो. एके काळी पुण्यातल्या वाडा संस्कृतीत राहणाऱ्यांची तिसरी पिढी आता (कुठल्या) कुठं गेली आहे, हे सांगतो. हे सगळं आपल्या आजूबाजूला घडताना आपण पाहतोच आहोत. त्यामुळं आपल्याच जगण्यातला आरसा समोर धरला आहे असं वाटावं इतपत हे सगळं वास्तवदर्शी आणि मनाला भिडणारं झालं आहे.
रमेश राजवाडे (सतीश आळेकर) हे पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक. त्यांची दुसरी पिढीही याच व्यवसायात आहे आणि व्यवसाय आता चांगलाच बहरला आहे. कडक स्वभावाचे, शिस्तशीर असे रमेश राजवाडे घरातल्या सर्वांनी या व्यवसायात साथ द्यावी, यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, त्यांच्या नातवंडांना या व्यवसायात रस नाही. त्यांना त्यांचं आपलं जग खुणावतंय. एकीला मॉडेल व्हायचंय, एकीला परदेशी भाषा शिक्षणात शिक्षिका व्हायचंय, एकाला वेगवेगळ्या रंगांचे शूज घालायला आवडत असतात आणि त्याची खरी पॅशन अजून कुणालाच कळलेली नाही. मात्र, आपण आजोबांना एके दिवशी हेडलाइन मिळवून देणार, असं तो खात्रीनं सांगत असतो. (आणि शेवटी पोलिस घरी येतात, तेव्हा तसं करूनही दाखवतो.) या सगळ्यांचं आपापलं एक व्हर्चुअल जग आहे. त्यात प्रेम, पॅशन, सेक्स, इंटिमसी, वेगळं काही करण्याची ओढ असं सगळं काही आहे. आपल्या आई-वडिलांनी आपल्या खोलीत येताना दारावर टकटक करूनच यावं, अशा विचारांची ही पिढी आहे. रमेश राजवाडे आणि त्यांच्या पत्नी (इम्पेकेबल ज्योती सुभाष) आता बदलण्याच्या पलीकडं गेले आहेत. त्यामुळं खरी घुसमट होतेय ती राजवाडेंच्या मधल्या पिढीची - अर्थात त्यांच्या तीन मुलांची, म्हणजेच विद्याधर (सॉलिड सचिन खेडेकर), लक्ष्मी (मार्व्हलस मृणाल कुलकर्णी) आणि शुभंकर (अतुल्य अतुल कुलकर्णी) यांची. यांना वडिलांचंही मन जपायचंय आणि मुलांनाही दुखवायचं नाहीये. एके दिवशी राजवाडेंचा पुण्यातला पेठांमधला वाडा रिडेव्हलपमेंटला निघतो आणि हे सगळं कुटुंब गावाबाहेर एका मोठ्या इमारतीत स्थलांतरित होतं. हे स्थलांतर एका अर्थानं प्रतीकात्मकही आहे. आपल्या मुळांपासून किंचितही सुटून येताना जुन्या पिढीला खूपच त्रास होतोय. मधल्या पिढीची संभ्रमावस्था संपत नाहीये, तर तिसऱ्या पिढीला नवं आकाश गवसल्यागत झालंय. या सर्वांना एक जोड आहे ती या घरात येणाऱ्या एका अनाहूत पाहुण्याची. हा पाहुणा खरं तर त्यांच्यातलाच एक असतो; पण अनेक वर्षांनी तो परतलेला असतो. त्याच्या येण्यामुळं या कुटुंबात काहीशी खळबळ माजते. वडीलधारे अस्वस्थ होतात, मधले नेहमीप्रमाणे बिचकतात, तर मुलं खूश होतात. पुढं काय घडतं, हे प्रत्यक्ष पडद्यावरच पाहायला हवं. शिवाय यात अतुल कुलकर्णीनं साकारलेल्या पात्राचीही एक वेगळी गंमत आहे. ती गंमत पाहताना मजा येते.
'राजवाडे' प्रामुख्यानं तरून जातो तो त्याच्या यूथफुल अपीलमुळं. मराठी सिनेमात शहरी उच्च किंवा श्रीमंत वर्गाचं हे असं क्रॉस सेक्शन दाखवणारं चित्रण पूर्वी आल्याचं आठवत नाही. बाकी हा संघर्ष तसा नवा नाही. खरं तर यात दाखवलेल्या अतिश्रीमंत कुटुंबामुळं तो फारसा ताणाचाही वाटत नाही. तरी तो आहे. आपल्या जागी संघर्ष आहेच. हा सिनेमा पाहताना अनेकांना रेखाचा खूबसूरत किंवा आत्ताचा दिल धडकने दो किंवा यासारख्या काही सिनेमांची आठवण झाली तरी आश्चर्य वाटू नये. हे श्रीमंत सराफ कुटुंबांचं नेपथ्य निवडण्यामागं फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. फायदा म्हणजे यातल्या पात्रांना जगण्यासाठी करावा लागणारा मूलभूत संघर्ष माहिती नाही. त्यामुळं ते (आणि दिग्दर्शकही) त्यांच्या तुलनेत लहान, पण त्यांच्यासाठी मोठ्या असणाऱ्या समस्यांवरच लक्ष केंद्रित करायला मोकळे झाले आहेत. तोटा असा, की मराठीत या वर्गाची संख्या अजूनही मर्यादित असल्यानं उर्वरित फार मोठ्या प्रेक्षकवर्गाला त्याच्याशी रिलेट होणं अवघडच आहे. किंबहुना या कुटुंबाची श्रीमंती पाहून आपल्याविषयी न्यूनगंडच निर्माण होतो, हे नक्की.
'राजवाडे' आणखी तरून जातो तो यातल्या पात्र निवडीमुळं. सर्वांची कामं अगदी बावनकशी झाली आहेत. सचिन, मृणाल किंवा अतुल यांचं किंवा सतीश आळेकर वा ज्योती सुभाष यांचं आपण आता चांगल्या अभिनयाबद्दल कौतुक करणं हेही पिवळा पितांबर म्हणण्यासारखं होईल. पण विशेष उल्लेख करायला हवा तो सिद्धार्थ मेनन, मृण्मयी गोडबोले, आलोक राजवाडे अन् कृतिका देव यांनी केलेल्या भूमिकांचा. किंबहुना ही चार पोरं म्हणजेच या सिनेमाची खरी जान आहेत. यांचे लूक, त्यांचं स्टाइलिंग आणि त्यांचा अटिट्यूड पाहण्याजोगा आहे. शिवाय अमित्रियान पाटील असं विचित्र नाव असलेला एक नवा कलाकार यात आहे. त्याचा लूक आणि एकूण वावर सिनेमाच्या ग्लॅम कोशंटमध्ये भरच घालतो. 'तगमग... तगमग' हे या मुलांचं गाणं आणि त्याचं चित्रिकरण झक्कास आहे. शिवाय सचिनचं पुण्याविषयीचं प्रेम या सिनेमात ठायी ठायी दिसतं. रात्रीचं पुणं दाखवणारं एक गाणं यात आहे. ते पाहायला मस्त वाटतं.
'राजवाडे'विषयी तक्रारच करायची तर ती यातल्या ओव्हरब्रँडिंगची करता येईल. दुसरे एक नामांकित सराफ, एक बिल्डर, एक बँक, एक कार आणि एक.... ब्ला ब्ला ब्ला गोष्टींच्या एवढ्या जाहिराती केल्या आहेत आणि त्या एवढ्या भातातल्या खड्यासारख्या टोचतात की विचारू नका. हे ब्रँडिंग टाळून सिनेमा होणारच नाही का? एक मात्र आहे. सचिनचा हा सिनेमा 'ब्रँड पुणे'चा सिनेमा आहे. खासकरून पुणे-२, पुणे-३० आणि पुणे-२९ चा हाय-ब्रो ब्रँड!
---
दर्जा - साडेतीन स्टार
----

19 Oct 2015

नवा चित्रपट - अनाहत

स्त्रीच्या देहभानाची अनवट कहाणी
-----------------------------------------

स्त्री-पुरुष लैंगिक संबंध ही मानवाच्या अस्तित्वाशीच निगडित व तितकीच आदिम अशी बाब. अनाहतपणे चालत आलेली; स्त्री व पुरुष दोघांच्याही दृष्टीने आनंदाची, उत्कटतेची, आवेगाची! मात्र, दर वेळी या संबंधांत स्त्रीला तिची अशी काही आवड, तिची अशी काही निवड व्यक्त करण्याची संधी दिली जाते का? किंबहुना स्त्रीने असा आनंद घ्यावा, असं आजही किती पुरुषांना मोकळेपणानं मान्य होतं? स्त्रीला हा अधिकार आपण देणार आहोत की नाही? - अनाहत हा अमोल पालेकरांचा नवा मराठी चित्रपट अशा अनेक प्रश्नांना जन्म देणारा आणि त्यातून प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा.
सुरेंद्र वर्मा यांच्या 'सूर्य की अंतिम किरण से सूर्य की पहली किरण तक' या नाटकावर हा चित्रपट आधारलेला आहे. पालेकरांनी हा विषय निवडला, त्याच वेळी त्याची अंगभूत वैशिष्ट्ये आणि मर्यादाही स्पष्ट झाल्या होत्या. म्हणजे असं की, अशा सिनेमाचा भाषक प्रेक्षकवर्ग कदाचित मर्यादित असू शकतो आणि त्याचं भाषेपलीकडचं विषयाचं म्हणून जे अपील असतं, ते कदाचित एकदम जागतिक दर्जाचं असू शकतं. हे एकदा गृहीत धरलं, की स्वीकारलेल्या चौकटीत पालेकरांनी जी मांडणी केली आहे, ती प्रेक्षणीय करून दाखविली आहे, हे निश्चित.
चित्रपटाची कथा घडते इसवी सन पूर्व दहाव्या शतकात. कोण्या एका मल्लदेशाची श्रावस्ती ही राजधानी. तिथं या देशाचा राजा (अनंत नाग) व त्याची धर्मपत्नी महाराणी शीलवती (सोनाली बेंद्रे) सुखा-समाधानानं नांदत असतात. दुःख एकच असतं - राजाला मूल नसतं. याला कारणही राजाच; कारण दोष त्याच्यातच असतो. गादीवर बसल्यानंतर सात वर्षांनी वारस जाहीर करण्याची पद्धत असते. मात्र, आठ वर्षांनीही राजाला मूल होत नाही, म्हटल्यावर राणीनं शास्त्रसंमत अशा 'नियोग विधी'ला सामोरं जावं, असा निर्णय अमात्य सभा घेते. 'नियोग' म्हणजे राणीनं एका रात्रीपुरता उपपती निवडून त्याच्याशी संग करणे आणि राज्याला वारस देणे. राजा 'राजकर्तव्य' म्हणून या विधीला संमती देतो खरा; पण त्याच्यातला 'पती' कोसळून पडतो. त्याची बालमैत्रीण महत्तरिका (दीप्ती नवल) त्याला मानसिक आधार देते.
इकडं महाराणीला काही मूलभूत प्रश्न पडतात व ती ते महाअमात्यांना (प्रदीप वेलणकर) विचारतेही. हा विधी करण्याआधी माझी संमती विचारण्याची गरज तुम्हाला का भासली नाही? विधी केल्यानंतरही मूल झालं नाही किंवा मुलगीच झाली तर, तिला तुम्ही राजपद देणार काय? - शीलवतीच्या या प्रश्नांना अमात्यांकडं उत्तरं नसतात.
राणी नाइलाजानं 'नियोगा'ला सामोरी जाते. ती परत आल्यानंतर खचलेली असेल; पाप केल्याच्या भावनेनं तिचं मन सैरभैर झालं असेल, अशी सर्व जाणत्यांची अपेक्षा असते, पण होतं भलतंच. शीलवती महत्तरिकेला विचारते - 'असा असतो पुरुष? हे तू मला आधी का सांगितलं नाहीस? या रात्रीनं मला खूप काही दिलंय. हा देहाचा उत्सव मी मनसोक्त साजरा केलाय.'
शीलवतीला आलेलं हे (नसतं) भान बघून महत्तरिका, राजा, अमात्य सगळेच खचतात. मात्र, शीलवती अमात्यांना आज्ञा देते - 'हा विधी तीनदा करावा, असं शास्त्रात म्हटलंय ना! मग पुन्हा एकदा दवंडी द्या!'
नंतर शीलवती राजाकडे जाते व त्याला सांगते, 'मी माझ्या अनुभवांशी प्रामाणिक राहिले. मला जे काही तेव्हा वाटलं, ते मी मोकळेपणानं व्यक्त केलं. याचा अर्थ तुम्ही मला जे काही दिलं त्याच्याशी मी प्रतारणा केली असं नाही. तुमचं स्थान माझ्या हृदयात आधी जे होतं तेच राहील.' पार्श्वभूमीवर 'त्या' दवंडीचे स्वर ऐकू येत असतानाच चित्रपट संपतो...
...पालेकरांना जे काही सांगायचंय ते त्यांनी अतिशय नेमकेपणानं सांगितलंय. चित्रपटाचा कालावधी ९० मिनिटांचा आहे. चित्रपटाची निर्मिती-संकल्पना संध्या गोखले यांची. उच्च निर्मितीमूल्यं जपताना त्यांनी कोणतीही तडजोड केलेली नाही, हे जाणवतं. जयू पटवर्धन यांनी या 'पीरियड ड्रामा'ला योग्य अशी वेषभूषा केली आहे. तयार कपडेपट वापरण्याऐवजी त्यांनी स्वतंत्रपणे प्रत्येकाच्या वस्त्रांची निर्मिती केली आहे. हम्पी परिसरात केवळ १८ दिवसांत या चित्रपटाचं चित्रीकरण झालं. चित्रपटातील घटनांचा कालावधी केवळ एका रात्रीचा आहे. त्या दृष्टीनं देबू देवधर यांनी प्रत्येक प्रहरातील रात्रीचे बदलते रंग अप्रतिम चित्रित केलेत. चित्रपटाचील संगीत संकल्पना संध्या गोखले यांची. उदय भवाळकर यांच्या ध्रुपद गायकीचा समर्पक वापर त्यांनी करून घेतला आहे.
चित्रपटाची पटकथा व संवाद डॉ. समीर कुलकर्णी व संध्या गोखले यांच आहेत. 'त्या वेळची मराठी' म्हणून या चित्रपटात वापरलेली भाषा काहीशी क्लिष्टच आहे. मात्र, पटकथा बंदिस्त असल्याने चित्रपट आटोपशीर झालाय.
कलाकारांमध्ये सोनाली बेंद्रेसाठी हा चित्रपट 'माइलस्टोन' ठरावा. या चित्रपटात ती विलक्षण देखणी दिसली आहे. अर्थात केवळ तिच्या दिसण्याचा उल्लेख अपुरा ठरेल. सोनालीच्या अभिनयगुणांचंही दर्शन 'अनाहत'नं घडवलं आहे. राणीची आधीची असहायता, 'नियोग विधी'च्या निर्णयानंतरची उद्विग्नता, 'देहाचा उत्सव' अनुभवल्यानंतरचे चैतन्य आणि शेवटी राजावर असलेलं निखळ प्रेम या सर्व भावना सोनालीनं सुरेख व्यक्त केल्या. जयू पटवर्धन यांनी सोनालीसाठी केलेल्या वेषभूषेचा व तिच्या अलंकारांचाही खास उल्लेख करावा लागेल. एकूणच सोनालीच्या कारकिर्दीतील हा महत्त्वाचा चित्रपट म्हणावा लागेल. अनंत नाग हे रंगभूमीवरील जुने-जाणते कलावंत आहेत. त्यांनी राजाची घुसमट प्रभावीपणे दर्शवली आहे. राणी 'नियोग विधी'ला गेल्यानंतर राजाचं पती म्हणून कोसळणं त्यांनी नेमकेपणानं अभिनित केलं आहे. त्यांचं मराठीही प्रवाही व सुखद आहे. दीप्ती नवलसारख्या समर्थ अभिनेत्रीला मात्र फारसा वाव नाही. महत्तरिकेची भूमिकाच मुळात सहायक या स्वरूपाची आहे. ही भूमिका दीप्ती नवल यांनी पालेकरांच्या स्नेहाखातर स्वीकारली असावी, असं वाटतं. बाकी कलाकारांमध्ये प्रदीप वेलणकर, श्रीरंग गोडबोले, डॉ. विलास उजवणे यांनी आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत.
आणखी एक. चित्रपटाचा विषय बघता त्यात मसालेदार दृश्यं घेणं सहज शक्य होतं; पण पालेकरांनी ते जाणीवपूर्वक टाळलं, ही बाब अभिनंदनीय आहे. (कारण 'सूर्य की अंतिम किरण से...' हे नाटकर नीना गुप्तांनी अलीकडचं मुंबईच्या रंगमंचावर आणलं होतं; पण ते भलत्याच गोष्टींसाठी चर्चेत होतं.) सध्याच्या 'बूम'पटांच्या लाटेत असा निर्णय घेणं ही वेगळी गोष्ट आहे. मराठीत अशा प्रकारची भव्य निर्मिती होणं ही बाब मराठी चित्रपटसृष्टीसाठी दिलासादायक आहे.
---
(पूर्वप्रसिद्धी - सकाळ, पुणे, २९ सप्टेंबर २००३)
----