20 Oct 2015

राजवाडे अँड सन्स

'पेढी'जात संघर्ष
-------------------

राजवाडे अँड सन्स हा सचिन कुंडलकरचा नवा मराठी सिनेमा पाहताना सर्वांत जास्त कोणती गोष्ट अपील होत असेल, तर ते या सिनेमाचं तारुण्य. हा सिनेमा तरुण आहे, आजचा आहे, आजच्या मुलांचा आहे... त्यांची भाषा बोलतो. त्यांच्या नजरेतून जग दाखवतो. एके काळी पुण्यातल्या वाडा संस्कृतीत राहणाऱ्यांची तिसरी पिढी आता (कुठल्या) कुठं गेली आहे, हे सांगतो. हे सगळं आपल्या आजूबाजूला घडताना आपण पाहतोच आहोत. त्यामुळं आपल्याच जगण्यातला आरसा समोर धरला आहे असं वाटावं इतपत हे सगळं वास्तवदर्शी आणि मनाला भिडणारं झालं आहे.
रमेश राजवाडे (सतीश आळेकर) हे पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक. त्यांची दुसरी पिढीही याच व्यवसायात आहे आणि व्यवसाय आता चांगलाच बहरला आहे. कडक स्वभावाचे, शिस्तशीर असे रमेश राजवाडे घरातल्या सर्वांनी या व्यवसायात साथ द्यावी, यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, त्यांच्या नातवंडांना या व्यवसायात रस नाही. त्यांना त्यांचं आपलं जग खुणावतंय. एकीला मॉडेल व्हायचंय, एकीला परदेशी भाषा शिक्षणात शिक्षिका व्हायचंय, एकाला वेगवेगळ्या रंगांचे शूज घालायला आवडत असतात आणि त्याची खरी पॅशन अजून कुणालाच कळलेली नाही. मात्र, आपण आजोबांना एके दिवशी हेडलाइन मिळवून देणार, असं तो खात्रीनं सांगत असतो. (आणि शेवटी पोलिस घरी येतात, तेव्हा तसं करूनही दाखवतो.) या सगळ्यांचं आपापलं एक व्हर्चुअल जग आहे. त्यात प्रेम, पॅशन, सेक्स, इंटिमसी, वेगळं काही करण्याची ओढ असं सगळं काही आहे. आपल्या आई-वडिलांनी आपल्या खोलीत येताना दारावर टकटक करूनच यावं, अशा विचारांची ही पिढी आहे. रमेश राजवाडे आणि त्यांच्या पत्नी (इम्पेकेबल ज्योती सुभाष) आता बदलण्याच्या पलीकडं गेले आहेत. त्यामुळं खरी घुसमट होतेय ती राजवाडेंच्या मधल्या पिढीची - अर्थात त्यांच्या तीन मुलांची, म्हणजेच विद्याधर (सॉलिड सचिन खेडेकर), लक्ष्मी (मार्व्हलस मृणाल कुलकर्णी) आणि शुभंकर (अतुल्य अतुल कुलकर्णी) यांची. यांना वडिलांचंही मन जपायचंय आणि मुलांनाही दुखवायचं नाहीये. एके दिवशी राजवाडेंचा पुण्यातला पेठांमधला वाडा रिडेव्हलपमेंटला निघतो आणि हे सगळं कुटुंब गावाबाहेर एका मोठ्या इमारतीत स्थलांतरित होतं. हे स्थलांतर एका अर्थानं प्रतीकात्मकही आहे. आपल्या मुळांपासून किंचितही सुटून येताना जुन्या पिढीला खूपच त्रास होतोय. मधल्या पिढीची संभ्रमावस्था संपत नाहीये, तर तिसऱ्या पिढीला नवं आकाश गवसल्यागत झालंय. या सर्वांना एक जोड आहे ती या घरात येणाऱ्या एका अनाहूत पाहुण्याची. हा पाहुणा खरं तर त्यांच्यातलाच एक असतो; पण अनेक वर्षांनी तो परतलेला असतो. त्याच्या येण्यामुळं या कुटुंबात काहीशी खळबळ माजते. वडीलधारे अस्वस्थ होतात, मधले नेहमीप्रमाणे बिचकतात, तर मुलं खूश होतात. पुढं काय घडतं, हे प्रत्यक्ष पडद्यावरच पाहायला हवं. शिवाय यात अतुल कुलकर्णीनं साकारलेल्या पात्राचीही एक वेगळी गंमत आहे. ती गंमत पाहताना मजा येते.
'राजवाडे' प्रामुख्यानं तरून जातो तो त्याच्या यूथफुल अपीलमुळं. मराठी सिनेमात शहरी उच्च किंवा श्रीमंत वर्गाचं हे असं क्रॉस सेक्शन दाखवणारं चित्रण पूर्वी आल्याचं आठवत नाही. बाकी हा संघर्ष तसा नवा नाही. खरं तर यात दाखवलेल्या अतिश्रीमंत कुटुंबामुळं तो फारसा ताणाचाही वाटत नाही. तरी तो आहे. आपल्या जागी संघर्ष आहेच. हा सिनेमा पाहताना अनेकांना रेखाचा खूबसूरत किंवा आत्ताचा दिल धडकने दो किंवा यासारख्या काही सिनेमांची आठवण झाली तरी आश्चर्य वाटू नये. हे श्रीमंत सराफ कुटुंबांचं नेपथ्य निवडण्यामागं फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. फायदा म्हणजे यातल्या पात्रांना जगण्यासाठी करावा लागणारा मूलभूत संघर्ष माहिती नाही. त्यामुळं ते (आणि दिग्दर्शकही) त्यांच्या तुलनेत लहान, पण त्यांच्यासाठी मोठ्या असणाऱ्या समस्यांवरच लक्ष केंद्रित करायला मोकळे झाले आहेत. तोटा असा, की मराठीत या वर्गाची संख्या अजूनही मर्यादित असल्यानं उर्वरित फार मोठ्या प्रेक्षकवर्गाला त्याच्याशी रिलेट होणं अवघडच आहे. किंबहुना या कुटुंबाची श्रीमंती पाहून आपल्याविषयी न्यूनगंडच निर्माण होतो, हे नक्की.
'राजवाडे' आणखी तरून जातो तो यातल्या पात्र निवडीमुळं. सर्वांची कामं अगदी बावनकशी झाली आहेत. सचिन, मृणाल किंवा अतुल यांचं किंवा सतीश आळेकर वा ज्योती सुभाष यांचं आपण आता चांगल्या अभिनयाबद्दल कौतुक करणं हेही पिवळा पितांबर म्हणण्यासारखं होईल. पण विशेष उल्लेख करायला हवा तो सिद्धार्थ मेनन, मृण्मयी गोडबोले, आलोक राजवाडे अन् कृतिका देव यांनी केलेल्या भूमिकांचा. किंबहुना ही चार पोरं म्हणजेच या सिनेमाची खरी जान आहेत. यांचे लूक, त्यांचं स्टाइलिंग आणि त्यांचा अटिट्यूड पाहण्याजोगा आहे. शिवाय अमित्रियान पाटील असं विचित्र नाव असलेला एक नवा कलाकार यात आहे. त्याचा लूक आणि एकूण वावर सिनेमाच्या ग्लॅम कोशंटमध्ये भरच घालतो. 'तगमग... तगमग' हे या मुलांचं गाणं आणि त्याचं चित्रिकरण झक्कास आहे. शिवाय सचिनचं पुण्याविषयीचं प्रेम या सिनेमात ठायी ठायी दिसतं. रात्रीचं पुणं दाखवणारं एक गाणं यात आहे. ते पाहायला मस्त वाटतं.
'राजवाडे'विषयी तक्रारच करायची तर ती यातल्या ओव्हरब्रँडिंगची करता येईल. दुसरे एक नामांकित सराफ, एक बिल्डर, एक बँक, एक कार आणि एक.... ब्ला ब्ला ब्ला गोष्टींच्या एवढ्या जाहिराती केल्या आहेत आणि त्या एवढ्या भातातल्या खड्यासारख्या टोचतात की विचारू नका. हे ब्रँडिंग टाळून सिनेमा होणारच नाही का? एक मात्र आहे. सचिनचा हा सिनेमा 'ब्रँड पुणे'चा सिनेमा आहे. खासकरून पुणे-२, पुणे-३० आणि पुणे-२९ चा हाय-ब्रो ब्रँड!
---
दर्जा - साडेतीन स्टार
----

No comments:

Post a Comment