19 Oct 2015

नवा चित्रपट - अनाहत

स्त्रीच्या देहभानाची अनवट कहाणी
-----------------------------------------

स्त्री-पुरुष लैंगिक संबंध ही मानवाच्या अस्तित्वाशीच निगडित व तितकीच आदिम अशी बाब. अनाहतपणे चालत आलेली; स्त्री व पुरुष दोघांच्याही दृष्टीने आनंदाची, उत्कटतेची, आवेगाची! मात्र, दर वेळी या संबंधांत स्त्रीला तिची अशी काही आवड, तिची अशी काही निवड व्यक्त करण्याची संधी दिली जाते का? किंबहुना स्त्रीने असा आनंद घ्यावा, असं आजही किती पुरुषांना मोकळेपणानं मान्य होतं? स्त्रीला हा अधिकार आपण देणार आहोत की नाही? - अनाहत हा अमोल पालेकरांचा नवा मराठी चित्रपट अशा अनेक प्रश्नांना जन्म देणारा आणि त्यातून प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा.
सुरेंद्र वर्मा यांच्या 'सूर्य की अंतिम किरण से सूर्य की पहली किरण तक' या नाटकावर हा चित्रपट आधारलेला आहे. पालेकरांनी हा विषय निवडला, त्याच वेळी त्याची अंगभूत वैशिष्ट्ये आणि मर्यादाही स्पष्ट झाल्या होत्या. म्हणजे असं की, अशा सिनेमाचा भाषक प्रेक्षकवर्ग कदाचित मर्यादित असू शकतो आणि त्याचं भाषेपलीकडचं विषयाचं म्हणून जे अपील असतं, ते कदाचित एकदम जागतिक दर्जाचं असू शकतं. हे एकदा गृहीत धरलं, की स्वीकारलेल्या चौकटीत पालेकरांनी जी मांडणी केली आहे, ती प्रेक्षणीय करून दाखविली आहे, हे निश्चित.
चित्रपटाची कथा घडते इसवी सन पूर्व दहाव्या शतकात. कोण्या एका मल्लदेशाची श्रावस्ती ही राजधानी. तिथं या देशाचा राजा (अनंत नाग) व त्याची धर्मपत्नी महाराणी शीलवती (सोनाली बेंद्रे) सुखा-समाधानानं नांदत असतात. दुःख एकच असतं - राजाला मूल नसतं. याला कारणही राजाच; कारण दोष त्याच्यातच असतो. गादीवर बसल्यानंतर सात वर्षांनी वारस जाहीर करण्याची पद्धत असते. मात्र, आठ वर्षांनीही राजाला मूल होत नाही, म्हटल्यावर राणीनं शास्त्रसंमत अशा 'नियोग विधी'ला सामोरं जावं, असा निर्णय अमात्य सभा घेते. 'नियोग' म्हणजे राणीनं एका रात्रीपुरता उपपती निवडून त्याच्याशी संग करणे आणि राज्याला वारस देणे. राजा 'राजकर्तव्य' म्हणून या विधीला संमती देतो खरा; पण त्याच्यातला 'पती' कोसळून पडतो. त्याची बालमैत्रीण महत्तरिका (दीप्ती नवल) त्याला मानसिक आधार देते.
इकडं महाराणीला काही मूलभूत प्रश्न पडतात व ती ते महाअमात्यांना (प्रदीप वेलणकर) विचारतेही. हा विधी करण्याआधी माझी संमती विचारण्याची गरज तुम्हाला का भासली नाही? विधी केल्यानंतरही मूल झालं नाही किंवा मुलगीच झाली तर, तिला तुम्ही राजपद देणार काय? - शीलवतीच्या या प्रश्नांना अमात्यांकडं उत्तरं नसतात.
राणी नाइलाजानं 'नियोगा'ला सामोरी जाते. ती परत आल्यानंतर खचलेली असेल; पाप केल्याच्या भावनेनं तिचं मन सैरभैर झालं असेल, अशी सर्व जाणत्यांची अपेक्षा असते, पण होतं भलतंच. शीलवती महत्तरिकेला विचारते - 'असा असतो पुरुष? हे तू मला आधी का सांगितलं नाहीस? या रात्रीनं मला खूप काही दिलंय. हा देहाचा उत्सव मी मनसोक्त साजरा केलाय.'
शीलवतीला आलेलं हे (नसतं) भान बघून महत्तरिका, राजा, अमात्य सगळेच खचतात. मात्र, शीलवती अमात्यांना आज्ञा देते - 'हा विधी तीनदा करावा, असं शास्त्रात म्हटलंय ना! मग पुन्हा एकदा दवंडी द्या!'
नंतर शीलवती राजाकडे जाते व त्याला सांगते, 'मी माझ्या अनुभवांशी प्रामाणिक राहिले. मला जे काही तेव्हा वाटलं, ते मी मोकळेपणानं व्यक्त केलं. याचा अर्थ तुम्ही मला जे काही दिलं त्याच्याशी मी प्रतारणा केली असं नाही. तुमचं स्थान माझ्या हृदयात आधी जे होतं तेच राहील.' पार्श्वभूमीवर 'त्या' दवंडीचे स्वर ऐकू येत असतानाच चित्रपट संपतो...
...पालेकरांना जे काही सांगायचंय ते त्यांनी अतिशय नेमकेपणानं सांगितलंय. चित्रपटाचा कालावधी ९० मिनिटांचा आहे. चित्रपटाची निर्मिती-संकल्पना संध्या गोखले यांची. उच्च निर्मितीमूल्यं जपताना त्यांनी कोणतीही तडजोड केलेली नाही, हे जाणवतं. जयू पटवर्धन यांनी या 'पीरियड ड्रामा'ला योग्य अशी वेषभूषा केली आहे. तयार कपडेपट वापरण्याऐवजी त्यांनी स्वतंत्रपणे प्रत्येकाच्या वस्त्रांची निर्मिती केली आहे. हम्पी परिसरात केवळ १८ दिवसांत या चित्रपटाचं चित्रीकरण झालं. चित्रपटातील घटनांचा कालावधी केवळ एका रात्रीचा आहे. त्या दृष्टीनं देबू देवधर यांनी प्रत्येक प्रहरातील रात्रीचे बदलते रंग अप्रतिम चित्रित केलेत. चित्रपटाचील संगीत संकल्पना संध्या गोखले यांची. उदय भवाळकर यांच्या ध्रुपद गायकीचा समर्पक वापर त्यांनी करून घेतला आहे.
चित्रपटाची पटकथा व संवाद डॉ. समीर कुलकर्णी व संध्या गोखले यांच आहेत. 'त्या वेळची मराठी' म्हणून या चित्रपटात वापरलेली भाषा काहीशी क्लिष्टच आहे. मात्र, पटकथा बंदिस्त असल्याने चित्रपट आटोपशीर झालाय.
कलाकारांमध्ये सोनाली बेंद्रेसाठी हा चित्रपट 'माइलस्टोन' ठरावा. या चित्रपटात ती विलक्षण देखणी दिसली आहे. अर्थात केवळ तिच्या दिसण्याचा उल्लेख अपुरा ठरेल. सोनालीच्या अभिनयगुणांचंही दर्शन 'अनाहत'नं घडवलं आहे. राणीची आधीची असहायता, 'नियोग विधी'च्या निर्णयानंतरची उद्विग्नता, 'देहाचा उत्सव' अनुभवल्यानंतरचे चैतन्य आणि शेवटी राजावर असलेलं निखळ प्रेम या सर्व भावना सोनालीनं सुरेख व्यक्त केल्या. जयू पटवर्धन यांनी सोनालीसाठी केलेल्या वेषभूषेचा व तिच्या अलंकारांचाही खास उल्लेख करावा लागेल. एकूणच सोनालीच्या कारकिर्दीतील हा महत्त्वाचा चित्रपट म्हणावा लागेल. अनंत नाग हे रंगभूमीवरील जुने-जाणते कलावंत आहेत. त्यांनी राजाची घुसमट प्रभावीपणे दर्शवली आहे. राणी 'नियोग विधी'ला गेल्यानंतर राजाचं पती म्हणून कोसळणं त्यांनी नेमकेपणानं अभिनित केलं आहे. त्यांचं मराठीही प्रवाही व सुखद आहे. दीप्ती नवलसारख्या समर्थ अभिनेत्रीला मात्र फारसा वाव नाही. महत्तरिकेची भूमिकाच मुळात सहायक या स्वरूपाची आहे. ही भूमिका दीप्ती नवल यांनी पालेकरांच्या स्नेहाखातर स्वीकारली असावी, असं वाटतं. बाकी कलाकारांमध्ये प्रदीप वेलणकर, श्रीरंग गोडबोले, डॉ. विलास उजवणे यांनी आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत.
आणखी एक. चित्रपटाचा विषय बघता त्यात मसालेदार दृश्यं घेणं सहज शक्य होतं; पण पालेकरांनी ते जाणीवपूर्वक टाळलं, ही बाब अभिनंदनीय आहे. (कारण 'सूर्य की अंतिम किरण से...' हे नाटकर नीना गुप्तांनी अलीकडचं मुंबईच्या रंगमंचावर आणलं होतं; पण ते भलत्याच गोष्टींसाठी चर्चेत होतं.) सध्याच्या 'बूम'पटांच्या लाटेत असा निर्णय घेणं ही वेगळी गोष्ट आहे. मराठीत अशा प्रकारची भव्य निर्मिती होणं ही बाब मराठी चित्रपटसृष्टीसाठी दिलासादायक आहे.
---
(पूर्वप्रसिद्धी - सकाळ, पुणे, २९ सप्टेंबर २००३)
----

No comments:

Post a Comment