31 Jul 2023

कुमार कथा जुलै २३

राघवची दिवाळी...
----------------------
दिवाळीच्या सुट्टीची चाहूल लागली तशी राघवला आपल्या मित्राकडं जायचे वेध लागले. पुण्यात दर वेळी एकाच पद्धतीने दिवाळी साजरी करायचा त्याला आला होता कंटाळा... राघवला कुणी सख्खं भावंड नव्हतं. पण दिवाळीच्या सुट्टीत त्याचे आत्ये-मामे-मावस-चुलत भावंडं एकत्र जमून दंगा करायची. राघव लहान होता, तोवर त्याला त्यांच्यासोबत खेळायला मजा वाटायची. नंतर नंतर त्याला त्या सगळ्यांबरोबर खेळायला बोअर व्हायला लागलं. त्यांच्यातल्या दोन मोठ्या तायांनी तर त्यांचा वेगळा ग्रुपच केला होता. बाकीचे भाऊ-बहीण सगळे राघवपेक्षा लहान होते. राघवचे बाबा खराडीमध्ये एका मोठ्या कंपनीत काम करायचे, तर आईचं ऑफिस सेनापती बापट रोडला होतं. दोघंही कायम बिझी असायचे. दर वीकएंडला कुठं तरी हॉटेलात जाऊन तेच तेच पिझ्झे, पास्ते आणि पनीर टिक्का मसाले खाऊन राघवला कंटाळा आला होता. आपण या तीन पदार्थांचा संपूर्ण जन्मातला कोटा तेराव्या वर्षापर्यंतच पूर्ण केलाय, असं त्यानं मागच्या मे महिन्यात एका चुलतबहिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीत जाहीर करून टाकलं होतं. राघव आता सातवीत गेला होता. त्याला या दिवाळीत काही तरी वेगळं करायचं होतं. मागच्या दिवाळीत त्यांच्या शाळेनं घरच्या घरी पणत्या, मेणबत्त्या वगैरे करायला लावून त्या घरोघरी विकायला लावल्या होत्या. सुरुवातीला राघवला मजा आली; मात्र नंतर कुणाच्याही घरी जाऊन पैसे मागायचे ही आयडिया त्याला बोअर व्हायला लागली. शेवटी त्याच्या आईनं तिच्या ग्रुपमध्ये त्या सगळ्या पणत्या खपवल्या आणि राघवला पैसे दिले, तेव्हा त्याला हुश्श झालं.
राघवच्या वर्गात होता रघू. तो नुकताच, म्हणजे गेल्या वर्षी त्याच्या वर्गात आला होता. मात्र, वर्ष-सव्वा वर्षात राघवची व रघूची चांगली गट्टी जमली होती. रघूचा मामा आयआयटीतून इंजिनीअर झाला होता; मात्र नोकरी न करता त्यानं पुण्याजवळ एक फार्म हाऊस, म्हणजेच शेतघर बांधलं होतं आणि तिथंच थोडी शेतजमीन घेऊन तो त्यात नवनवे शेतीचे प्रयोग करीत होता. त्याचं नाव आनंदमामा. मुळशी तालुक्यात सांदणवाडी नावाच्या छोट्या गावात तो राहायचा. रघूला हा मामा फार आवडायचा. त्यात राघवला सख्खा मामा नसल्यानं त्याला रघूचा फार हेवा वाटायला लागला. रघू यंदाची दिवाळी मामाकडं जाऊन शेतावर साजरी करणार आहे, हे कळल्यावर राघवला तर फारच ‘जेलस’ वाटायला लागलं. शेवटी त्यानं हिय्या करून रघूला विचारलंच - मलाही येता येईल का रे तुझ्या मामाकडे? रघूनं हे ऐकताच आनंदानं उडीच मारली. ‘अरे, मीच तुला विचारणार होतो, की तू येतोस का माझ्यासोबत?’ असं म्हणून त्यानं राघवला टाळी मागितली. राघवचे डोळे आनंदानं लकाकले आणि त्यानं रघूला टाळी तर दिलीच, वर मित्राला एक घट्ट मिठीही मारली.
दोघांनी एकत्रच सांदणवाडीला जायचं, असं ठरलं होतं. मात्र, राघवचे बाबा नेमके त्याच दिवशी परदेशात जाणार असल्यानं रघू मामासोबत पुढं निघून गेला. बाबांना ‘बाय’ करण्यासाठी राघवनं घरीच थांबावं, अशी त्याच्या आईची इच्छा होती. राघवलाही बाबासाठी थांबावंसं वाटू लागलं. पण त्यानं एकट्यानं एसटी बसनं सांदणवाडीला जायची परवानगी मागितली. बाबाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. आई बसमध्ये बसवून द्यायला येणार होती आणि तिकडं आनंदमामा रघूसोबत उतरवून घ्यायला येणार होता. मग काही प्रश्नच येणार नव्हता! सगळं ठरलं. ठरल्याप्रमाणे बाबा त्या दिवशी संध्याकाळी कॅब करून मुंबईला फ्लाइट पकडायला निघून गेला. बाबा गेल्यामुळं राघव आणि त्याच्या आईला फारच बोअर व्हायला लागलं. मग ते दोघं आईच्या टू-व्हीलरवरून जवळच राहणाऱ्या त्याच्या आजी-आजोबांकडं गेलं. त्या सोसायटीत राघव नेहमीच जात असल्यानं तिथंही त्याचे काही मित्र होतेच. त्यांच्यासोबत गप्पा मारताना वेळ कसा गेला ते कळलंच नाही. रात्री झोपतानाही राघवच्या डोळ्यांसमोर ती कधीही न बघितलेली सांदणवाडी आणि तिथं जाण्यासाठी होणारा एसटीचा पहिलावहिला एकट्यानं करायचा प्रवास याचीच स्वप्नं पडत राहिली.
सकाळ झाल्यावर कुठलीही सबब न सांगता, राघवनं स्वत:हून सगळं भराभर आवरलं. सॅक भरली. नवा टी-शर्ट आणि जीन्स, नवे शूज घालून तो अगदी सज्ज झाला. ब्रेकफास्ट करून झाला. आईनं कॅब बुक केली आणि ते दोघं स्वारगेटला निघाले. आईनं त्याला वडगावच्या बसमध्ये बसवून दिलं. कंडक्टरलाही सांगितलं. सांदणवाडी फाट्यावर आनंदमामा येणार होताच. तसं तिनं मोबाइलवरून मामाला कळवलं. राघवकडेही बटणांचा मोबाइल फोन होता. त्याच्या आई-बाबांनी नुकताच त्याला तो घेऊन दिला होता. स्मार्टफोन मात्र त्याला दहावी झाल्यावरच मिळणार होता. राघव खूश होता. गाडीत बऱ्यापैकी गर्दी होती. मात्र, खूप खचाखच भरलेलीही नव्हती. त्याला व्यवस्थित खिडकीची सीट मिळाली होती. एसटीचा हा एकट्यानं केलेला त्याचा पहिलाच प्रवास पुढं अविस्मरणीय ठरणार आहे, याची त्याला तरी कुठं कल्पना होती!
गाडी सुरू झाली. पौड रोडवरून चांदणी चौकात आली. नव्यानं झालेल्या फ्लायओव्हरच्या भुलभुलय्यातून ड्रायव्हरदादांनी बरोबर गाडी पौडच्या दिशेनं काढली. राघव बाहेर बघत होता. त्यांच्या कारपेक्षा बसची उंची जास्त असल्यानं इथून बाहेरचं सगळं दृश्य वेगळंच दिसत होतं. राघव बऱ्याच दिवसांनी एसटीत बसला होता. यापूर्वी आपण एसटीत कधीच बसलो नव्हतो, असंच त्याला वाटत होतं. तो सगळ्या प्रवाशांचं निरीक्षण करत होता. काही जण शर्ट-पँट घातलेले, तर काही धोतर नेसलेले. काही पायजमा घालणारे, तर एखाद-दुसरा तरुण बर्मुड्यावर. बायका बहुतेक साडीत. दिवाळीचा सीझन असल्यानं जरा जास्तच नट्टा-पट्टा केलेल्या. त्यातल्या काही मावशा नऊवारी साडी नेसलेल्या, मोठ्ठं कुंकू लावलेल्या. लहान मुलंही होती त्या गाडीत. त्यांची एक तर रडारड सुरू होती, नाही तर आरडाओरडा. या सगळ्या गोंधळात ड्रायव्हरकाका एकदम शांतपणे समोर बघून गाडी चालवत होते, तर कंडक्टरकाका सगळ्यांना सांभाळत, तिकीटवाटपाच्या कामात मग्न होते. राघवला फार मजा वाटत होती. त्यानं हळूच त्याच्या सॅकमधून आईनं दिलेला खाऊ काढला. त्यात एक बेसनाचा लाडू होता, तर काही कडबोळी! राघवनं शेजारी बसलेल्या मुलाला कडबोळी द्यायचा प्रयत्न केला, पण तो छोटासा मुलगा नुसताच हसायचा आणि पलीकडं बसलेल्या त्याच्या आईकडं बघायचा. आई बहुतेक मानेनंच त्याला ‘काही घ्यायचं नाही दुसऱ्याचं’ असं सुचवीत असावी. कारण ते पोरगं नुसतंच हसत होतं. अर्धा तास प्रवास केल्यावर गाडी थांबली. कुठला तरी स्टॉप आला असेल, असं आधी सगळ्यांना वाटलं. पण तसं नव्हतं. कारण गाडीच्या आजूबाजूला तसं काहीच नव्हतं. ड्रायव्हरनं गाडी थोडी रस्त्याच्या कडेला लावली होती. तो खाली उतरला. काही तुरळक प्रवासीही लगेचच खाली उतरले. थोड्या वेळानं कंडक्टरकाका बातमी घेऊन आले, की गाडी बंद पडली आहे. राघवला ते ऐकून जरा भीती वाटली. म्हणजे आपण इथं कुठं फसलो, यापेक्षा आनंदमामा व रघू त्याची वाट बघत फाट्यावर थांबलेले असतील या कल्पनेनं त्याला जरा काळजी वाटली. राघवने पटकन मोबाइल काढला. फोन करून आनंदमामाला उशिराचं कळवावं, असा विचार त्याने केला. मात्र, त्यांची बस जिथं थांबली होती तिथं मुळीच रेंज नव्हती. त्यामुळं राघवचा तो प्रयत्नही फोल ठरला.
हळूहळू बसमधले सगळेच प्रवासी खाली उतरले. हवा थंडगार होती. आजूबाजूला डोंगर होते, झाडी होती. नुकत्याच संपलेल्या पावसाळ्यामुळं धरणी सगळी हिरवीगार झाली होती. राघवला ते दृश्य बघून मनोमन आनंद झाला. रघूच्या गावी किती मजा येईल, याचा विचार तो करू लागला. एसटीतले बहुतेक सगळे लोक खाली उतरले होते. त्यातले काही जण नक्कीच वैतागले होते, मात्र बरेच जण आनंदात होते. कुणी एकमेकांशी गप्पा मारत होते, कुणी नुसतेच फिरत होते, कुणी आपल्याजवळच्या खाण्याच्या जिनसा काढून खात होते, तर काही जण ड्रायव्हर-कंडक्टरशी बोलत होते. दुरुस्तीला बराच वेळ लागणार, असं कळलं. राघव आता जरा काळजीत पडलाच. आनंदमामाचा फोन लागणं महत्त्वाचं होतं. त्यानं गाडीतल्या काही लोकांना विचारून त्यांच्या फोनला रेंज आहे का हे विचारलं. मात्र, तिथं कुठल्याच फोनला रेंज नव्हती. थोड्या अंतरावर जरा चढावर काही घरं दिसत होती. तिथपर्यंत गेलं, तर रेंज येईल, असं कुणी तरी म्हणालं. काही लोक तिकडं निघालेही. राघवला काय वाटलं कुणास ठाऊक; तोही त्या लोकांसोबत चालू लागला. पाच-दहा मिनिटांची उभी चढण चढल्यावर ती छोटी वाडी आली. तिथली घरं अगदी नवी बांधलेली दिसत होती. मोजून आठ-दहा घरं असावीत. तिथं पोचल्यावर राघवच्या सोबत आलेल्या माणसांनी तिथल्या पहिल्या घरात डोकावून, एसटी बंद पडल्याचं सांगितलं. त्या घरातल्या कारभाऱ्यानं तातडीनं पाण्याचा गडू आणून त्यांच्यासमोर ठेवला. माठातलं ते गार पाणी पिऊन सगळ्यांनाच छान वाटलं. त्या घरातून एक मावशी बाहेर आल्या. त्यांनी पण पुन्हा सगळी चौकशी केली. त्यांच्या मागून हळूच एक छोटी मुलगी डोकावली. असेल सहा-सात वर्षांची! राघवला ती मुलगी फार आवडली. तीही राघवकडं बघून हसली. त्या घरातही दिवाळीचं वातावरण होतं. समोर एक आकाशकंदील टांगला होता. घरासमोर चांगली रांगोळी काढली होती. पणत्या ठेवल्या होत्या. दुपारची वेळ झाली होती. एसटी दुरुस्त व्हायची काही चिन्हं नव्हती. त्या घरापासून खाली रस्त्यावर उभी असलेली गाडी स्पष्ट दिसत होती. थोड्या वेळात अजून एक एसटी तिथं आलेली दिसली. ती पुण्याच्या दिशेनंच निघाली होती. राघवच्या गाडीचा ड्रायव्हर त्या एसटीच्या ड्रायव्हरशी काही तरी बोलला. राघव हे सगळं वरून बघत होता. त्याला एकदम आनंदमामाची आठवण आली. त्यानं मोबाइल काढला, तर अगदी थोडीशी रेंज आली होती. त्यानं लगेच मामाला फोन लावला. बराच वेळ रिंग वाजली, पण कुणी फोन उचलला नाही. राघवनं हताश होऊन फोन बंद केला.
ती लहान मुलगी मगापासून राघवकडंच बघत होती आणि नुसतीच हसत होती. तिचा गालगुच्चा घ्यावा, असं राघवला फार वाटलं. अर्थात त्यानं लगेच तसं काही केलं नाही. त्याच्याबरोबर आलेले माणसं आणि त्या घरातले काका आता गप्पा मारायला लागले. राघवचा एक कान तिकडं होताच. त्याला त्या गप्पांमधून कळलं, की चार-पाच वर्षांपूर्वी त्या गावावर दरड कोसळली होती आणि इथल्या वस्तीतील बरीच घरं त्या दरडीखाली दबून जमीनदोस्त झाली होती. त्या गावातील अनेक लोकांचा जीव त्या भयंकर दुर्घटनेत गेला होता. त्या घरातील एक मुलगाही त्या दुर्घटनेत गेला होता. हे सांगताना त्या काकांना आणि त्या मावशींना हुंदका आवरेना. वातावरण अचानक गंभीर झालं. राघवला आता राहवेना. तो अचानक पुढं झाला आणि त्या मुलीला म्हणाला, तुझं नाव काय गं? त्यावर ती मुलगी ‘माझं नाव ऊर्मी’ असं म्हणून आत पळून गेली. राघवनं तिला परत हाक मारली, तशी ती आतून एक वस्तू घेऊन बाहेर आली. तिच्या हातात एक घड्याळ होतं. ते घड्याळ अर्थातच बंद होतं. तिच्या भावाचं ते घड्याळ होतं. जेव्हा दरड पडली, तेव्हाची - पहाटे पावणेचारची - वेळ अजूनही ते घड्याळ दाखवत होतं. तिचा भाऊ तेव्हा वरच्या बाजूला असलेल्या त्याच्या मित्राच्या घरी झोपायला गेला होता. दुर्दैवानं तेच घर सर्वांत आधी दरडीखाली सापडलं आणि त्यातच तिच्या भावाचा प्राण गेला होता.
ऊर्मीनं ते घड्याळ राघवला दाखवलं. ती काहीच बोलली नाही. तिची आईच बोलत होती. एकीकडं हुंदके देत होती. बोलता बोलता अचानक म्हणाली, पोरा, तुझ्याएवढाच होता रे आमचा कृष्णा... राघवच्या पोटात एकदम गलबललं. त्याच्या हातात त्याच्या बाबांनी परदेशातून आणलेलं भारीतलं घड्याळ होतं. त्याला काय वाटलं, कुणास ठाऊक! त्यानं एकदम ते घड्याळ काढलं आणि ऊर्मीला दिलं. तो एकदम म्हणाला - ऊर्मी, मलाच तू कृष्णा समज. मीच आता तुझा भाऊ...
त्याचं हे बोलणं ऐकून ऊर्मी तर आनंदानं उड्याच मारायला लागली. तिच्या आईला तर अश्रूच आवरेनात. तिनं राघवला पोटाशी धरलं. राघवसोबत आलेली एसटीतील माणसं चकित होऊन हे सगळं बघत होती. ऊर्मीचे बाबाही भारावले होते. त्या मुलीच्या आईनं आतून एक तबक आणलं आणि त्या मुलीच्या हातात दिलं. तिनं तिला राघवला ओवाळायला सांगितलं. राघवला काहीच समजेना. तो आश्चर्यचकित होऊन त्या मावशींकडं बघत होता. त्या म्हणाल्या, ‘अरे बाळा, आता दोन-तीन दिवसांत भाऊबीज येईलच. आमच्या ऊर्मीला ओवाळण्यासाठी आता कुणीच नव्हतं ना... आता तू तिचा भाऊ झालास... म्हणून ही ओवाळणी. आता दर वर्षी इथं यायचं...’
अवघ्या काही मिनिटांत तयार झालेल्या त्या विलक्षण नात्याबद्दल आपल्याला नक्की काय वाटतंय हे राघवला ठरवता येईना. आजूबाजूचे सगळेच तसे विस्मयचकित होऊन हा सोहळा पाहत होते.
अचानक खाली एसटीजवळ गलका ऐकू आला. ती एक जीप होती. त्यातून एक उंचापुरा, हॅट घातलेला माणूस आणि एक मुलगा उतरले. अरेच्चा! हा तर रघू आणि तो बहुतेक त्याचा आनंदमामा असणार... राघवनं वरून, लांबून बघूनच त्यांना ओळखलं. तो उड्या मारतच खालच्या रस्त्याला आला. रघूला बघताच त्यानं त्याला जोरदार मिठी मारली. आनंदमामानं त्याला एक टप्पल मारली आणि म्हणाला, चला राघवशेठ! आम्ही आलो आहोत तुला न्यायला... तुझी एसटीची सफर इथंच पुरे आता...
राघवला कळेचना, की आनंदमामाला कसं कळलं की आपली गाडी बंद पडलीय ते... मामानं सांगितलं, की त्याचा एक मित्र बाइकवरून पुण्याहून त्याच्या गावी येत होता. वाटेत एक एसटी बंद पडल्याचं त्यानं सहज मामाला सांगितलं. राघवचा फोन लागेना तशी मामाला काळजी वाटू लागली आणि एका क्षणी त्यानं आपली जीप काढून उलट पुण्याच्या दिशेनं जायचा निर्णय घेतला. त्या ठिकाणाहून मामाचं फार्म हाऊस फार लांब नव्हतं. जेमतेम १०-१२ किलोमीटर अंतरावर पुढं ते होतं.
आता राघवनं एसटीतली त्याची बॅग काढली आणि तो मामाच्या जीपमध्ये बसला. एसटीतल्या लोकांना टाटा, बाय बाय करून ते तिघं मामाच्या फार्म हाऊसकडं निघाले. मामा म्हणाला, आता मजा येईल. तिकडं दिवाळी जोरात साजरी करू.
राघव मनात म्हणाला, माझी दिवाळी तर आधीच सुरू झाली आहे. भाऊबीज झाली पण...
मागून लाइट चमकले म्हणून त्यानं मागं बघितलं, तर तो ज्या एसटीतून येत होता, ती दुरुस्त होऊन अगदी त्यांच्या गाडीच्या मागे मागेच पळत येत होती... संध्याकाळ व्हायला लागली होती... राघवनं परत मागं बघितलं... दूर डोंगरावर एका घरावरचा आकाशकंदीलही आज जरा लवकरच प्रकाशमान झाला होता!

---

सुमीत राघवन मुलाखत - अक्षरधारा दिवाळी २२

‘सचोटीनं जगणं फार गरजेचं’


सुमीत राघवन हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत माहिती झालं ते ‘फास्टर फेणे’ या दूरदर्शन मालिकेपासून. अगदी लहान वयात अभिनयाची कारकीर्द सुरू केलेल्या सुमीतचं अष्टपैलुत्व गेल्या चार दशकांत विविध क्षेत्रांत सिद्ध झालेलं आहे. हिंदी दूरचित्रवाणीवरील सर्वांत लोकप्रिय कलाकार ते सामाजिक जाणीव जपणारा अस्सल मुंबईकर मराठी माणूस असा सुमीतनं सर्वत्र ठसा उमटवला आहे. या वर्षी ‘एकदा काय झालं...!’ या मराठी चित्रपटातील सुमीतचं अप्रतिम काम वाखाणलं गेलं. याशिवाय ‘वागले की दुनिया’ या मालिकेतील त्याचा ‘राजेश वागळे’ घरोघरी लोकप्रिय झाला आहेच. अशा या हरहुन्नरी आणि उत्तम अभिनेत्याशी खास दिवाळीनिमित्त झालेला हा संवाद...

१. सुमीत, सध्या तुझा 'एकदा काय झालं...!!' चित्रपट गाजतो आहे. यातल्या तुझ्या भूमिकेविषयी सांग. त्या जोडीनेच असं विचारतो, की संवाद साधण्याचं, आपलं म्हणणं दुसऱ्यापर्यंत प्रभावीपणे पोचविण्याचं महत्त्व या कलाकृतीतून अधोरेखित केलंय. सध्याचा विसंवादाचा काळ बघता या गोष्टीचं महत्त्व तुला किती वाटतं?

सुमीत - आधी ही भूमिका माझ्यापर्यंत कशी आली ते सांगतो. प्रत्येक गोष्टीला एक पार्श्वभूमी असते, तसंच झालं. सलीलची (संगीतकार - दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी) आणि माझी मैत्री २००७ पासूनची. ‘सारेगमप’चं एक सेलिब्रिटी पर्व आलं होतं. त्यात चार मेंटॉर होते, त्यात एक सलील होता. सलील मला मेंटॉर करत नव्हता, पण तिकडं आमच्या भेटीगाठी व्हायच्या. मग दोस्ती झाली. त्यात आमच्या कॉमन आवडीचा विषय म्हणजे ‘गोलमाल.’ पालेकरांचा चित्रपट. हृषीदा, लतादीदी असे खूप कॉमन आवडीचे विषय निघाले. सलीलशी मग नियमित बोलणं सुरू झालं. अधूनमधून भेटी व्हायच्या. त्यानं ‘वेडिंगचा शिनेमा’ हा सिनेमा दिग्दर्शित केलाय, हेही समजलं. दरम्यान,  नोव्हेंबर २०१९ मध्ये मी माझ्या स्वत:च्या सिनेमाचा घाट घातला होता. सप्टेंबरपासून त्याची तयारी सुरू होती. तेव्हा आमचा कॉमन मित्र, जो आमचा कार्यकारी निर्माताही आहे, नितीन वैद्य - तो म्हणाला, की सलीलला तुला एक गोष्ट ऐकवायची आहे. सलील सिनेमा करणार म्हणजे काही प्रश्नच नाही. त्याच्या गाण्यात त्यात किती दर्जा त्यानं राखला आहे! मग केवळ औपचारिकता म्हणून मी ती स्क्रिप्ट ऐकली आणि त्या कथेच्या प्रेमात पडलो नसतो तरच नवल! माझ्या रेझ्युमेमधील मराठीतला हा पहिल्या क्रमांकाचा चित्रपट असेल, हे नक्की. आज ३७ वर्षं मी अभिनय करतोय. १९८५ पासून बालकलाकार म्हणून काम करायला मी सुरुवात केली. मी ज्या पद्धतीची कामं निवडतो, त्यात मी नेहमी आपल्याला काही तरी ‘ड्राइव्ह’ करणारं, आपल्या चौकटीतून, चाकोरीतून जरा बाहेर आणेल असं काही तरी काम करावं अशी माझी इच्छा असते. मग ती ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’मधील डॉ. श्रीराम लागूंची भूमिका असेल, किंवा ‘हॅम्लेट’सारखं नाटक असेल... तसा हा चित्रपट मिळाला. पहिल्यापासूनच त्या भूमिकेचा कुठे तरी सूर मिळाला. नट नेहमीच म्हणतात, की मी असा दिसेन, जरा वजन कमी करीन किंवा वाढवीन, जरा केस असे करीन वगैरे. हे सगळं बरोबर आहे. पण मला असं वाटतं, की सुरुवात आतून होते. आतून तो सूर मिळणं महत्त्वाचं असतं. मी १९९१ मध्ये चंद्रकांत कुलकर्णींचं ‘ज्वालामुखी’ नावाचं नाटक करत होतो. प्रभाकर पणशीकर आणि मोहन वाघ हे तेव्हा ३१ वर्षांनंतर पहिल्यांदा एकत्र आले होते. तिकडेच चिन्मयी आणि माझी पहिली भेट झाली. त्यामुळं माझ्यासाठी हे नाटक ‘स्पेशल’ आहे. (हसतो.) तेव्हा एक मित्र म्हणाला, की सुमीत, त्या भूमिकेचा सूर फार मस्त होता रे! तेव्हा मला पहिल्यांदा असं जाणवलं, की हा सूर गवसणं फार महत्त्वाचं असतं. म्हणजे तुम्हाला गाण्याचं अंग असणं हा भाग अलाहिदा; पण कुठल्याही भूमिकेचा एक अंतर्गत सूर असतो, तो सापडणं फार महत्त्वाचं आहे. या सिनेमाच्या बाबतीत सगळ्याच गोष्टींत हा एकजिनसीपणा होता. त्यामुळं खरं तर मला काही फार वेगळं करावं लागलं नाही किंवा ‘आता या भूमिकेचा विचार करतो’  वगैरे असं काही करावं लागलं नाही. सलीलनं जे मुळात लिहिलं होतं ते ओघवतं होतं. कुठंही ते ‘संवाद’ असे वाटत नव्हते. आपण रोज घरी बोलतो तशीच साधी-सोपी भाषा होती.
यातल्या संवादाबाबतच्या दुसऱ्या प्रश्नाविषयी सांगावंसं वाटतं, की यातल्या प्रभावी संवादाचा जो संदेश आहे, तो फारच महत्त्वाचा आहे. आता घरोघरी अगदी डायनिंग टेबलवरही आपण सगळे - मुलांसकट - हातात मोबाइल घेऊनच बसलेले असतो. कुठे तरी तो संवाद खुंटला आहे. हा तर झाला नेहमीच्या संवादाचा मुद्दा. मला असंही वाटतं, की गृहीत धरणंही वाढलं आहे. मग ते राजकीय पातळीवर असेल, धार्मिक पातळीवर असेल. आपण सतत मतं देऊन मोकळे होतो. दुसऱ्याची बाजू समजून घेणं याला खीळ बसलीय. म्हणूनच आज सगळीकडं तुम्हाला एक प्रक्षोभ जाणवतो. एक अस्वस्थता जाणवते. मला एखादी गोष्ट दुसऱ्याला सांगायची असेल, तर ती मी शांतपणे, एका जागी बसून सांगितली पाहिजे. घराघरांत हे होणं फार गरजेचं आहे. आज आपल्या कुटुंबाचेही व्हॉट्सअपचे ग्रुप झाले आहेत. त्यात काहीच गैर नाही. शुभेच्छाही आपण समाजमाध्यमांवरच देतो. आपण फोन उचलून एखाद्याला मनमोकळेपणाने शुभेच्छा नाही देत! या खूप बारीक बारीक गोष्टी आहेत. या सिनेमातून हेच सांगितलं आहे, की संवाद महत्त्वाचा आहे. मनं जपणं फार महत्त्वाचं आहे. संवाद साधत राहिलं पाहिजे. वाद होतातच, वाद होणारच. ‘अरे’ला ‘कारे’ होणारच. पण मार्ग निघू शकतो. माझे बाबा नेहमी म्हणतात, की जिकडे तुम्हाला वाटतं ना, की ठिणगी पडणार आहे, तर तिथून दोन पावलं मागेच राहा. नमतं घेण्यामध्ये तुमचं काहीही जात नाही. आपल्यामध्ये ना, एकूणच ॲप्रिसिएशन कमी झालेलं आहे. आपण कौतुक नाही करत पटकन! का हा आडमुठेपणा असतो, का इगो असतो, का माहिती नाही. पण कौतुक नाही केलं जात लवकर. आपल्यात इगो फार असतो. आपला इगो लहान हवा आणि विचार मोठा हवा. आपल्याकडे नेमकं उलटं असतं. 

२. तू टीव्हीवरचा एक अतिशय लोकप्रिय कलाकार आहेस. अनेक वर्षं आहेस. तुझी सध्या सुरू असलेली 'वागले की दुनिया' मी नियमित पाहतो. ती बघताना मला असं वाटतं किंवा जाणवतं, की यातला राजेश वागळे आणि तू यांच्यात बरंच साम्य असावं. तर त्याविषयी काय म्हणशील? मराठी घरांतली मध्यमवर्गीय मूल्यं जपण्याचा या मालिकेतून एक प्रयत्न जाणवतो. तो सुखद वाटतो. तुझं त्यात किती योगदान आहे? 

सुमीत - केवळ मराठीच नाही, तर जिकडं मध्यमवर्ग आहे त्या सगळ्यांचीच गी गोष्ट आहे. या वर्गाची जी मूल्यं आहेत, ती कुठं तरी लयास चालली आहेत, असं मला वाटतं. तर त्या मूल्यांची एकदा उजळणी व्हावी, त्यावर कुठं धूळ बसली असेल, तर ती झटकावी. आजी आणि आजोबांचं किती महत्त्व आहे, ते लोकांपर्यंत पोचावं. मान्य आहे की आज आपण एकत्र कुटुंबात नाही राहत, सगळ्या न्युक्लिअर फॅमिली आहेत; पण घरात कुठं मोठं माणूस आलं, तर त्याच्या पाया पडावं, त्यांना मिठी मारणं, त्यांची विचारपूस करणं हे सगळंच गरजेचं आहे. हा राजेश वागळे आहे माझ्यासारखा! थोडा साहिल साराभाईसुद्धा आहे माझ्यामध्ये (हसतो); पण ‘राजेश वागळे’ खूप आहे माझ्यामध्ये. याचं कारण मी एक नागरिक म्हणून खूप सजग आहे. रस्त्यांवरच्या खड्ड्यांपासून ते वाहतूक कोंडीपर्यंत सगळ्या गोष्टींचा मला खूप त्रास होतो. त्यामुळं तो एक ‘कॉमन मॅन’ प्रतिबिंबित करणारा मी एक नट आहे, असं मला वाटतं. मी माझ्या बाजूने सतत काही मुद्दे देत असतो मालिकेच्या लेखकांना. एखादं साधं वाक्य असेल, तर मला वाटतं, की नाही, आपण याला जरा धार आणू या. मध्यंतरी मासिक पाळीबद्दल आम्ही एक एपिसोड केला किंवा ‘गुड टच बॅड टच’बद्दल एक भाग केला. तर मला वाटतं, की त्यात मग उगाचच हातचं राखून नको काही करायला. करतोय ना, तर आपण बिनधास्त करू या. जास्तीत जास्त काय होईल? काही नकारात्मक प्रतिक्रिया येईल. पण खरं सांगायचं तर तसं काहीच होत नाही. उदाहरणार्थ, आम्ही एक ‘ॲडल्ट डायपर’वर एक भाग केला. तो एक ज्वलंत विषय आहे ज्येष्ठ नागरिकांचा. अशा वेळी कधी कधी त्यात संवाद अगदी बाळबोध येतात. मी लेखकांना दोष देत नाही, कारण त्यांना महिन्याकाठी २५-२५ एपिसोड लिहायचे असतात. उलट मी नेहमी म्हणतो, की टेलिव्हिजन असेल किंवा सिनेमा असेल, यात खरा सुपरस्टार कोण असतो तर ज्याच्या हातात पेन असतं ना, तो खरा सुपरस्टार असतो. आम्ही डॉ. लागू म्हणाले, तसं केवळ ‘लमाण’ आहोत. आम्ही त्यांचे शब्द फक्त प्रेक्षकांपर्यंत पोचवतो. ते आमचं कसब आहेच, पण तरी ‘शब्द’ महत्त्वाचे आहेत. पण कधी कधी असं होतं, की नाही एखाद्या संवादात मजा येत! मग मी तिथं मदत करतो. अशा वेळी तुमचा अनुभव महत्त्वाचा ठरतो. माझ्याकडं आज एक अवलंबून राहता येणारा कलाकार म्हणून बघितलं जातं. तर ते का बघितलं जातं? मी आमच्या निर्मात्याला विचारलंही, की नेहमी माझं पात्रच का ‘ग्यान’ देत असतं रे? मीच का सदैव ‘प्रभू रामा’च्या भूमिकेत असतो? तर तो म्हणाला, की सुमीत, तू जे बोलतोस ना, ते लोक ऐकतात. मी त्यावर एक पॉज दिला. तो म्हणाला, की फार कमी अभिनेते असे आहेत, की ते जे सांगतात ते लोक ऐकतात. तू त्यापैकी एक आहेस. 

३. मूल्यांचा विषय निघाला आहे, तर विचारतो, की तू स्वतः काहीएक मूल्यं मानणारा, जोपासणारा, त्याविषयी आग्रह धरणारा कलाकार आहेस. समाजात सध्या अनेक पातळ्यांवर या मूल्यांचा ऱ्हास होताना दिसतोय. तू या बदलांकडे कसं बघतोस? अस्वस्थ होतोस का? समाज म्हणून त्यावर काय उपाय केले पाहिजेत असं तुला वाटतं?

सुमीत - मूल्यांचा ऱ्हास होतोय आणि तो थांबवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपण सतत शॉर्ट टर्म विचार करतोय. आपल्याला आपल्या नात्यांचा टिकाऊपणा टिकवून ठेवला पाहिजे. पैसा कमावणं गरजेचंच आहे. ईएमआय हे आपल्या नशिबाचे भोग आहेत. पण तरी आपल्या कुटुंबासाठी वेळ काढणं, तो सत्कारणी लावणं या खूप छोट्या गोष्टी आहेत. सहज करता येण्यासारख्या आहेत. आजूबाजूला परिस्थिती कशीही असली, तरी जर घर चांगलं असेल ना, तर त्याचे पडसाद नक्कीच आजूबाजूला, समाजात उमटतात. आपण जेव्हा घरातून बाहेर पाऊल ठेवतो, तेव्हा हे विचार, संस्कार घेऊनच बाहेर पडत असतो. सतत उलट विचार करण्याची गरज नाही.  बाहेर आपल्यावर आक्रमणं होतच असतात वेगवेगळ्या गोष्टींची, विचारांची; त्यातलं काय घ्यायचं, काय नाही हे आपले विचार ठरवत असतात. आयुष्य खडतरच आहे, मुंबईतल्या रस्त्यांसारखं; पण सचोटीनं जगणं फार गरजेचं आहे. फार बेसिक आहे हे. कितीही उशीर झाला, तरी मी सिग्नल नाही म्हणजे नाही तोडत. हॉर्न नाही म्हणजे नाही वाजवत. मी कुणालाही लाच नाही म्हणजे नाहीच देत. कुठे पकडला गेलो, तरी मी सांगतो, की मला माफ करा. हे माझं लायसन्स आहे ते जप्त करा. मग मी जो काही दंड आहे तो भरतो. समाज असा आहे, तसा आहे असं म्हणून उपयोग नाही. तुम्ही स्वत:पासून सुरुवात करा. तुम्ही याच समाजाचे घटक नाही आहात का? तुम्हाला कशाला सतत ट्रॅफिक हवालदार लागतो शिस्त लावायला? आपण शिस्त पाळू शकत नाही का? महापालिकेवर मी टीका करतो, सरकारवर टीका करतो. पण टाळी दोन हातांनी वाजते. आम्ही रस्त्यावर कचरा टाकतो. मी रस्त्यावर कचरा टाकलाच नाही, तर किती फरक पडेल! आपण हा विचार का नाही करत?

४. तुझ्या करिअरची सुरुवात 'रंग उमलत्या मनाचे'सारख्या नाटकातून झाली. मध्यंतरी तू 'हॅम्लेट' साकारलास. तो एकूणच फार भव्य प्रयोग होता. त्या अनुभवाविषयी सांग... 

सुमीत - हो नक्कीच. माझं पहिलं नाटक ‘मला भेट हवी हो’ आधी आलं. ‘रंग उमलत्या मनाचे’ हे नंतर आलं. चंदूचं (दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी) ते पहिलं नाटक. त्याच्यानंतर लागोपाठ ‘ज्वालामुखी’ केलं १९९१ मध्ये. त्याच्यानंतर २८ वर्षं गेली मध्ये, आणि २०१८ मध्ये अचानक ‘हॅम्लेट’ झालं. चंदूचा फोन आला, की सुमीत, ‘हॅम्लेट’ करू या का? मी म्हटलं, अरे बापरे! नाही रे.  प्रामाणिकपणे सांगायचं तर मी नाही वाचलं काही शेक्सपिअरचं! मी शेक्सपिअर जो माहिती आहे तो विशाल भारद्वाजने सांगितलेला (हसतो) - ‘मकबूल’, ‘ओंकारा’ आणि ‘हैदर’मधून... तो हसला जोरात! मी म्हणालो, की मी तुझं बोट धरून चालणार. त्यावर तो म्हणाला, काहीच अडचण नाही. मी तुला सगळी माहिती पुरवत जाईन आणि आपण करू या. आणि ते झालं नाटक! चंद्रकांत कुलकर्णी हा एक असा दिग्दर्शक आहे, की ज्याला नाटक कळलंय! ज्याला रंगभूमी कळलेली आहे! तुम्ही हे प्रेक्षकाच्या दृष्टिकोनातून म्हणा, संहितेच्या दृष्टीने म्हणा, कोरिओग्राफी-मूव्हमेंट-कंपोझिशनच्या दृष्टीने म्हणा... त्याला ते सगळं इतर सुंदर कळलेलं आहे! त्यामुळे इतकी मजा आली ते करताना. आमचा ग्रुप होता त्यात इतकं काही शिकलो खरंच. काय तो होता शेक्सपिअर नावाचा जादूगार! कसं त्यानं लिहिलं असेल... ती हॅम्लेटची सद्सद्विवेकबुद्धी, ती विचार करायची वृत्ती, त्याच्यातलं कविमन, त्याच्यातला आईवर वेड्यासारखा प्रेम करणारा मुलगा, प्रजेच्या गळ्यातला ताईत... अशा इतक्या वेगवेगळ्या भूमिका ‘हॅम्लेट’च्या होत्या, ‘हॅम्लेट’ची रूपं होती. साडेचारशे वर्षांपूर्वी हे लिहिलेलं आहे. त्यात एक नाटकातलं नाटक असतं. त्यात शेक्सपिअर म्हणतो, की अतिरेक करू नका हं काम करताना; जरा नैसर्गिक ठेवा. पाहा हं, साडेचारशे वर्षांपूर्वी अभिनयाबाबत तो हे लिहून गेला आहे. टाळ्यांसाठी अतिरंजित करू नका काही! कमाल आहे. हे एक झालं. पण त्याचे सामाजिक विचार नीट तपासून बघितलेत तर ते आजही कुठे तरी लागू पडतात. हे खरे दूरदृष्टीचे लेखक. प्रशांत दळवी मला सतत लेखनाची सामग्री पुरवत होते. त्यातला एक सीन मी जरा इमोशनल करत होतो. दिग्दर्शकानंही मला तसं सांगितलं. तेव्हा मला डॉ. लागूंचं वाक्य आठवलं. रडणं फार सोपं आहे. उलट तुम्ही ते जेवढं आत ठेवाल, तेवढं ते प्रेक्षकांपर्यंत पोचतं. मला फार तथ्य वाटलं त्यात. जेवढं तुम्ही धुमसत ठेवाल आतमध्ये, तेवढं ते शेवटच्या प्रेक्षकापर्यंत पोचतं.

६. तू मराठी चित्रपट फार मोजके केलेस. पण त्यात तू 'द माधुरी दीक्षित'चा नायक होतास 'बकेट लिस्ट'मधे... तिच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? सोबतच, तू 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'मधे डॉ. लागूंची भूमिका फार प्रभावी साकारली होतीस. त्याही अनुभवाविषयी सांग...

सुमीत - मला जेव्हा तेजस देऊस्कर म्हणाला, की मी ‘बकेट लिस्ट’ ही फिल्म करतोय आणि माधुरी करणार आहे. तिच्यासोबत तुला काम करायचंय. मग मी त्याला म्हणालो, की अर्थातच! म्हणजे काय? करणारच. (खळखळून हसतो.) हे काय विचारतोयस फालतू? (खूप हसतो..) जेव्हा माधुरी तिचं आत्मचरित्र लिहील, तेव्हा ती लिहिणार नाही का, की हा माझा हिरो, मराठीतला माझा पहिला हिरो. मग संपलंच! हा झाला गमतीचा भाग. पण खरंच सांगायचं तर नक्कीच अंगावरून मोरपीस फिरवल्यासारखं झालं. हुरळूनच गेलो मी! उगाच असं नाही सांगणार, की छे! छे! त्यात काय... असं अजिबात नाही. माधुरीसोबत काम करताना मला खरंच काय सर्वांत आकर्षक वाटलं माहितीय का? तिची शिकण्याची वृत्ती. आज माधुरी हे फार मोठं नाव आहे. पण दिग्दर्शक सांगत असे, तेव्हा ती मान खाली घालून ऐकत असे. तीच गोष्ट शंकर महादेवनची. या लोकांकडून हे शिकण्यासारखं. माधुरीला मीही अनेक सूचना करायचो. आपण हे असं करू या, तसं करू या. त्यावर ‘हो हो करू या’ अशीच तिची प्रतिक्रिया असायची.
‘घाणेकर’बद्दल काय सांगू! जेव्हा मला कळलं, की मला डॉ. लागूंची भूमिका करायची आहे आणि स्क्रीनटाइम फारच कमी, म्हणजे दहा-पंधरा मिनिटांचा आहे. तरी मी म्हटलं, की मी ही भूमिका करतो, याचं कारण मी ‘बायोपिक’ कधी केला नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे डॉ. लागू होते तेव्हा. मला त्याही गोष्टीचा मोह पडला, की आपली ही भूमिका ते स्वत: बघतील. मी त्यांना भेटलो. त्यांच्याशी गप्पा झाल्या. त्यांना तेव्हा स्मृतिभ्रंशाचा त्रास होत होता. काही आठवत नव्हतं. मात्र, मी ‘१९७०’  हे आकडे त्यांच्यासमोर उच्चारले आणि ते ५० वर्षं मागं गेले.त्यांना सगळं खाडखाड आठवायला लागलं. स्मृतींचे काही कप्पे हे श्रावणातल्या झाडाप्रमाणे टवटवीत असतात ना, तसे त्यांचा कप्पा वाटला मला! तेव्हाच्या सगळ्या नाटकांबद्दल - ‘काचेचा चंद्र’पासून ‘गिधाडे’पर्यंत - ते अगदी भरभरून बोलले. सुरुवातीला तर त्यांनी ‘मी कुठला रोल करणं अपेक्षित आहे?’ असंच विचारलं. मला तेव्हा ते अगदी लहान मुलासारखे निरागस भासले. तेव्हा दीपाताईंनी सांगितलं, की मी त्यांचीच भूमिका करणार आहे म्हणून. त्यानंतर ते ‘हॅम्लेट’ बघायलाही आले आणि मला आशीर्वादही दिला. तीन तास ते त्या नाटकाला बसले, हीच माझ्यासाठी केवढी मोठी गोष्ट झाली. ‘घाणेकर’मध्ये ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ गाण्यात माझी एंट्री आहे तेव्हा मी मुद्दाम डॉ. लागूंची प्रतिक्रिया काय असेल, हे बघता येईल अशा सीटवर बसलो होतो. एंट्री झाली, आणि ते एकदम म्हणाले, ‘अगं दीपा, हा तर मीच आहे!’ आता याच्यापेक्षा काय मोठा पुरस्कार असू शकेल! 

७. तू अभिनयाव्यतिरिक्त गायनातही करिअर करू शकला असतास. तू 'सारेगमप'चा फायनलिस्ट होतास. शिवाय अनेक हिंदी 'रिॲलिटी शों'मधेही तू गाताना दिसतोस. 'वागले..'मधेही प्रसंगी पेटी पुढं ओढून गाताना दिसतोस. गाणं ही तुझी पॅशन आहे ना? त्याविषयी सांग...

सुमीत - मी काही उत्तम गायक नव्हतो. माझ्यासाठी तरी मी हौशीच गायक आहे. तसं गाण्याचं शिक्षण मी घेत होतो. सुरुवातीला वसंतराव कुलकर्णी आणि नंतर सुरेश वाडकरांकडे शिकलो. पण १९९०-९० मध्ये अभिनयातच भरपूर संधी मिळत गेल्या आणि गाणं जरा बाजूला राहिलं. गाणं की अभिनय, हा निर्णय मला घेणं गरजेचं होतं. दोन्ही डगरींवर पाय ठेवणं कठीण होतं. गाण्याला एक बैठक लागते. एक विचार लागतो. तो अभिनयालाही लागतो; पण अभिनयाला रियाझ लागत नाही. तो गाण्याला अगदी आवश्यक असतो. अभिनयात तुमचे बाकीचे जे सेन्सेस आहेत, ते ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. अनुभव गाठीशी असणं गरजेचं आहे. एखादी घटना पुन्हा सादर करण्याची शक्ती असणं हे गरजेचं आहे. अभिनयात अनेक इंटरप्रिटेशन्स असतात. मला ते कायम आव्हानात्मक वाटत आलेलं आहे. मी तुलना करत नाही. कदाचित मी थोडा आळशी आहे आणि रियाझ करावा लागू नये म्हणूनही मी अभिनयाकडे वळतो (हसतो...) पण हे खरंय, की मी गाणं मिस करतो आणि म्हणूनच माझ्याकडं सदैव पेटी असते माझ्या मेकअप रूममध्ये. मी वेळ मिळेल तसा गात असतो आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतही असतो. 

८. तुझी वाचनाची आवड सर्वांना माहिती आहे‌. तू 'अक्षरधारा'चा ब्रॅंड ॲंबेसिडरही होतास. तू सध्या काय वाचतोस? आवडते लेखक कोण?

सुमीत - खरं सांगायचं तर मला वेळ नाही मिळत वाचायला. इतकी धावपळ सुरू असते. चिन्मयी मात्र भरपूर वाचत असते. माझ्यामध्ये तेवढा पेशन्स नाही. मात्र, लिहावंसं वाटतं अनेकदा. पण त्यालाही एक बैठक लागते. असं धावत-पळत नाही लिहिता येत. काही तरी चमकदार येतं डोक्यात, पण ते तेवढ्यापुरतंच राहतं. एकदा मालिकेचं शूटिंग सुरू झालं, की माझे २७-२८ दिवस त्यातच जातात. माझ्या वेबसाइटवर मी ‘मनोगत’ असं जे लिहिलंय ना, त्याबद्दल सांगतो. मला फिल्म करायची आहे. दिग्दर्शन करायचं आहे. सीरियल किंवा ओटीटीमध्ये माझा पिंड नाहीय. मला एक सलग अशी कहाणी सांगायची आहे - ही सुरुवात, हा मध्यंतर आणि हा शेवट, अशी! मसा असं वाटतं, की मी एक बरा दिग्दर्शक होईन (हसतो). खरं तर २०१९ मध्ये सगळं जुळूनही आलं होतं, पण ते काही कारणानं बारगळलं. त्यामुळं मी सध्या गोष्ट शोधतोय. ती मिळाली, की लगेच फिल्म करणार. दिग्दर्शन मला करायचंय हे नक्की!

९. तू अनेक हॉलिवूड चित्रपटांच्या हिंदी डबिंगमधे voice over दिला आहेस. हा अनुभव कसा वाटतो? 

सुमीत - हे काम कौशल्याचं आहेच; शिवाय ते तुम्हाला पैसेही मिळवून देतं. करिअरच्या अगदी सुरुवातीला, १९९--९२ मध्ये माझ्याकडे फार काम नसायचं, तेव्हा १९९२ ते ९६ अशी चार वर्षं मी हे काम केलं. पण ते तेवढ्यापुरतंच होतं. पैसे मिळायचे चांगले, हे मात्र खरं! आजही कधी कधी विचारणा होते, पण आता डबिंग करणं होत नाही. 

१०. तुझ्या फिटनेसचं रहस्य काय?

सुमीत - मी माझ्या खाण्यावर जागरूकपणे लक्ष ठेवून असतो. आपल्या सिस्टीममध्ये काय जातं, हे नीट बघतो. आणि व्यायाम. दररोज अर्ध्या तासाचा व्यायाम करतो. विष्णुसहस्रनाम लावतो आणि त्याबरोबर माझा एक तीस मिनिटांचा व्यायाम असतो. जिमला जायला वेळ होत नाही, तरी घरी हे मी करतोच. महत्त्वाचं म्हणजे गोड खाणं सध्या बंद केलंय. हे मी असं टप्प्याटप्प्याने ठरवतो. म्हणजे आता पुढचे दोन महिने गोड नाही म्हणजे नाहीच. चहातून जेवढी साखर जाते तेवढीच. एरवी नाही तर मी मिठाईप्रेमी आहे. बसल्या बसल्या अर्धा किलो काजूकतली खाऊ शकतो (हसतो...) जिलेबी वगैरे तर... वेड लागतं मला! बासुंदी, खीर, आमरस हे सगळे जीवघेणे प्रकार आहेत. (खळाळून हसतो...)  पणहे सध्या मी सगळं टाळतो. आणि रोज संध्याकाळी सात वाजता जेवतो. त्यापुढे १३ तास काहीही खात नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच थेट नाश्ता करतो. त्यामुळं वजनही आटोक्यात राहतं.

११. तू व चिन्मयीनं मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत आवर्जून घातलंत. त्याविषयीची तुमची मतं अतिशय मननीय आहेत. त्याविषयी सांग.

सुमीत - या निर्णयात खरं तर चिन्मयीचा वाटा जास्त आहे. मी फक्त ‘मम’ म्हणायचं काम केलंय. चिन्मयीच्या घरचं वातावरण भाषेला महत्त्व देणारं आहे. तिचे बाबा आयएएस होते. ते स्वत: कवी. वाचनाची अतिशय आवड, कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करायचे. ज्ञानेश्वरी त्यांना मुखोद्गत होती. उर्दूवरही त्यांची तितकीच पकड. गालिब, कबीर सगळे आवडते. तिची आई मानसशास्त्रज्ञ. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाच्या त्या प्रमुख होत्या. त्याही लेखिका. बहीण शिवप्रिया सुर्वे कवयित्री. त्यामुळे तिचं ठरलंच होतं, की आमची मुलं मराठी माध्यमात शिकणार. आमच्या घरी हा जरा शॉक होता. कारण माझं कुटुंब अगदीच वेगळं. त्यांना वाटत होतं, की मराठीत कशाला? इंग्लिश मीडियममध्ये शिकायला हवं. पण शेवटी चिन्मयीनं ते त्यांच्या गळी उतरवलंच. ती म्हणाली, की नाही. घरातली जी भाषा आहे त्याच भाषेत जर मूल शिकलं तर ते चांगलं शिकतं. हा कदाचित बाळबोध विचार आहे, पण तसा सिद्ध झालेला विचार आहे. इंग्लिश भाषेला ना नाही. पुढं इंग्लिश येणारच आहे त्यांना. तेच झालं आणि. माझा मुलगा इंग्लिश गाणी कंपोझ करतो, इंग्लिश गाणी लिहितो. भाषा ही मुळात कधीच अडथळा असता कामा नये. विंबल्डनच्या कोर्टवर रफाएल नदाल जेव्हा स्पॅनिशमध्ये बोलतो, तेव्हा आपल्याला त्रास होत नाही. तेच जर आपण मराठीत बोललो तर लगेच - ‘शी! किती गावठी आहे हा!’ अशी प्रतिक्रिया कशाला? मीदेखील चिन्मयीच्या मताचाच आहे. नंतर माझीही मतं त्याविषयी आग्रही झाली. मला वाटतं, मराठी भाषा यायलाच हवी. माझा मराठीत बोलण्याचा आग्रह असतो. मी कुठेही गेलो, तरी आधी मराठीतच बोलायला सुरुवात करतो. समोरच्याला समजलं नाही तर इतर भाषा वापरतो. पण सुरुवात मराठीतूनच करतो. मला वाटतं, हा आपल्यासाठी नियम असायला हवा. महाराष्ट्रात महाराष्ट्राचीच भाषा बोलली जायला हवी. चिन्मयीच्या या विचारांना, मराठीबाबत ती जे काही काम करीत आहे त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. या कामाबाबत समाजातही कुठे कुठे थोडे तरी तरंग आम्हाला दिसत आहेत. कुणी फोन करून सांगतं, की आम्हीही आमच्या मुलांना मराठी माध्यमात घातलं आहे. ती ज्योत कुठे तरी पेटली आहे, असं वाटतं.

---

(पूर्वप्रसिद्धी : अक्षरधारा दिवाळी अंक २०२२)

----