13 Jul 2013

फर्स्ट डे फर्स्ट शो - भाग मिल्खा भाग

आपल्या नसानसांतून 'धावणारा' प्रेरणापट...




भारताचे महान धावपटू मिल्खासिंग यांची - ज्यांना सर्व जग गौरवानं 'फ्लाइंग सिख' म्हणून ओळखतं - अपूर्व जीवनगाथा कधी तरी हिंदी चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर झळकेल, अशी आपण कल्पनाही केली नव्हती. परंतु राकेश ओमप्रकाश मेहरा या आघाडीच्या दिग्दर्शकानं हे आव्हान पेललंय आणि त्यांनी हा मिल्खा नावाचा अवलिया धावपटू पडद्यावर अक्षरशः जिवंत केलाय. मेहरांसोबतच हा मिल्खा जगणारा अभिनेता फरहान अख्तर याचंही श्रेय तेवढंच महत्त्वाचं. या दोघांच्या ध्यासातून साकारलेला हा सिनेमा पाहणं म्हणजे एक भावनोत्कट अनुभव आहे. चांगला सिनेमा या व्याख्येच्या तांत्रिक फूटपट्ट्यांमध्ये 'भाग मिल्खा भाग' बसत नसेलही... किंबहुना नाहीच बसत - परंतु तरीही तो एक मस्ट वॉच सिनेमा आहे. याचं कारण या सिनेमाच्या कथानायकाशी या देशाचं आणि देशातील प्रत्येक नागरिकाचं जैव नातं जडलेलं आहे; रक्ताचं नातं जडलेलं आहे. हे नातं तुटलेल्या मायभूमीचं आहे, डोळ्यांसमोर 'कत्ले-आम' झालेल्या सर्व आप्तेष्टांचं आहे, या देशाचा ब्लेझर अंगावर मिरविण्याच्या अभिमानाचं आहे, लाखो आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसमोर तिरंगा लहरत असताना आणि राष्ट्रगीत वाजत असताना ऊर भरून येण्याचं आहे... फाळणीच्या जखमा घेऊन निर्वासितांच्या कॅम्पमध्ये दीनवाणेपणे जगताना डोळ्यांत भव्य स्वप्न घेऊन जगायचं आहे, कष्ट-निर्धार आणि समर्पणातून शून्यातून विश्व उभं करण्याचं ते नातं आहे आणि त्यामुळंच प्रत्येक भारतीय प्रेक्षक कथानायकाच्या प्रत्येक व्यथेशी आणि प्रत्येक यशाशी एकरूप होतो. सध्या हयात असलेल्या एखाद्या गाजलेल्या व्यक्तिमत्त्वावर सिनेमा बनविताना प्रेक्षकांना त्याची ही पूर्वपीठिका माहिती असणं हा नक्कीच त्या सिनेमासाठी पूरक घटक ठरतो. अर्थात मिल्खासिंग कोण आहेत आणि या देशाच्या क्रीडा इतिहासात त्यांचं नक्की काय स्थान आहे, याचा केवळ पाठ्यपुस्तकातला धडा असावा तसा हा सिनेमा नाही, हेही इथं आवर्जून नमूद करायला हवं. ही मिल्खासिंग नावाच्या माणसाची स्वतःशी चाललेली लढाई आहे आणि या लढाईत तो काय जिद्दीनं विजय मिळवतो, याची ही वीरविजयगाथा आहे. अॅथलिट मिल्खासिंग यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा सिनेमा म्हणून हा सिनेमा पाहायला जाल, तर फसगत होईल. क्रीडा क्षेत्रातील आकडेवारीच्या भाषेत बोलायचं तर मिल्खासिंग यांनी ४०० मीटर्सच्या शर्यतीत ४५.८ सेकंदांचं वर्ल्ड रेकॉर्ड त्या काळात स्थापन केलं, हे त्यांचं सर्वोच्च यश होतं. अॅथलेटिक्सच्या 'ट्रॅक अँड फिल्ड' प्रकारात तोपर्यंत कोणीही भारतीय एवढ्या उत्तुंग कामगिरीच्या जवळही गेला नव्हता. १९५६ च्या मेलबर्न ऑलिंपिकमध्ये आलेल्या अपयशानंतर मिल्खासिंग यांचे डोळे उघडले. त्यांनी त्यानंतर अफाट मेहनत करून टोकियोच्या एशियाडमध्ये दोन सुवर्णपदकांची कमाई केली (तीही त्या वेळी आशियात अव्वल धावपटू म्हणून गाजत असलेल्या पाकिस्तानच्या अब्दुल खलीदला हरवून) आणि त्यानंतर कार्डिफमधील कॉमनवेल्थ गेम्समध्येही भारताला ४०० मीटर्समध्ये सुवर्णपदक मिळवून दिलं. त्यामुळंच १९६० च्या रोम ऑलिंपिक स्पर्धेत पंतप्रधान पंडित नेहरूंपासून सर्व देशवासीयांना मिल्खासिंग यांच्याकडून सुवर्णपदकाचीच अपेक्षा होती. मात्र, या सर्वांत महत्त्वाच्या स्पर्धेत मिल्खासिंग चौथ्या स्थानावर फेकले गेले. ही वास्तवातल्या मिल्खासिंग यांच्या करिअरची आकडेवारी आहे.
सिनेमा हे सगळं सांगतो, पण तो सिनेमाचा केंद्रबिंदू नाहीच. फाळणीच्या वेळी पाकिस्तानातल्या गावात धर्मांधांकडून वडिलांचं डोकं उडवलं जात असताना, भाग मिल्खा भाग या त्यांच्या जीवघेण्या आरोळीपासून कायम धावतच राहिलेल्या एका शूर सरदार मुलाची ही गोष्ट आहे. दिल्लीतल्या निर्वासित कॅम्पमध्ये जगत असताना बहिणीच्या आसऱ्यानं मोठं झालेल्या एका एकाकी मुलाची ही कथा आहे. उमलत्या वयात बीरोवर वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या, नंतर प्रेमभंग झाल्यावर आर्मी जॉइन करणाऱ्या आणि एक ग्लास दुधाच्या अपेक्षेनं धावण्याची शर्यत जिंकण्याची उमेद ठेवणाऱ्या एका साध्या-भोळ्या भारतीय तरुणाची ही कहाणी आहे. मिल्खासिंग नावाच्या तरुणाची ही गोष्ट अशी प्रातिनिधिक पातळीवर नेऊन दिग्दर्शकानं फार मोठं यश मिळवलं आहे. त्यामुळं ही फक्त एका गाजलेल्या क्रीडापटूची चरित्रवजा मांडणी उरत नाही... तर जगातल्या प्रत्येक अडथळ्यावर, संकटावर जिद्दीनं मात करण्याची प्रेरणा जागवणाऱ्या तरुणाईची ही गोष्ट बनते.
राकेश ओमप्रकाश मेहरा आपल्या कलाकृतीवर अफाट मेहनत घेतात. ते प्रत्येक दृश्यात जाणवतंही. पीरियड फिल्म बनवणं, त्यासाठी उत्कृष्ट दर्जाचं कलादिग्दर्शन असणं या आता फार अवघड गोष्टी नाहीत. मेहनतीच्या जरूर आहेत. मेहरांसारख्या दिग्दर्शकाकडून ती किमान अपेक्षा असतेच. मेहरांची एक विशिष्ट शैली आहे. एखादा विलंबित ख्यालातला राग गायकानं तब्येतीनं रंगवावा, अशी त्यांची मांडणी असते. आता अनेकांना ही मांडणी कंटाळवाणी वाटू शकते. नव्हे, वाटतेच. त्यामुळंच तीन तास आठ मिनिटांचा हा लांबलचक सिनेमा पाहताना हे सगळं एवढं यात हवंच होतं का, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. मेहरा मात्र प्रत्येक तपशील खुलवून, सावकाश सांगण्यावर भर देतात. पूर्वार्धात या प्रकारच्या मांडणीचा कंटाळा येऊ शकतो. उत्तरार्धात मिल्खासिंग यांची मैदान मारण्याची कामगिरी सुरू होते आणि कथेलाही थोडा वेग येतो. अर्थात मिल्खासिंग यांच्या करिअरमधला सर्वोच्च बिंदू म्हणजे त्यांनी सेट केलेलं ४५.८ सेकंदांचं वर्ल्ड रेकॉर्ड. मात्र, मेहरांच्या गोष्टीत ही बाब क्लायमॅक्सला येत नाही. रोममधला त्यांचा जिव्हारी लागणारा पराभवही नाही. किंबहुना तो पराभव सुरुवातीलाच त्यांनी दाखविला आहे. याउलट पाकिस्तानबाबत लहानपणी अत्यंत कटू भावना असताना, नेहरूंच्या आग्रहाखातर लाहोरला जाणं आणि तिथं पुन्हा एकदा खलिदला हरवून अयूब खान यांच्याकडून फ्लाइंग सिख हा गौरव मिळवणं या बिंदूवर सिनेमाचा शेवट करण्याचा निर्णय दिग्दर्शकानं घेतला आहे. तेवढी सिनेमॅटिक लिबर्टी त्यांना आहे, कारण या बिंदूमध्ये असलेलं नाट्य रंगवणं दिग्दर्शकाला मोह पाडणारंच आहे. मिल्खासिंग यांचं पाकिस्तानात जाणं, आपल्या मूळ गावाला, घराला भेट देणं हे सगळं दाखवून मग तेथील मित्रत्वाच्या शर्यतीत त्यांनी खलिदला हरवणं यात अनेक प्रतीकं सामावलेली आहेत. मेहरांनी ती नेमकी टिपलीयत.
सिनेमाची कथा सांगताना दिग्दर्शकानं अनेक फ्लॅशबॅक, तर कधी फ्लॅशबॅकमध्ये आणखी एक फ्लॅशबॅक असे प्रकार वापरले आहेत. 'सेपिया टोन'विषयी मेहरांना असलेली प्रीती आता सर्वांना माहिती आहे. सेपियाटोनचे फ्लॅशबॅक जमले असले, तरी पूर्वार्धात ते बरेचसे ताणले गेले आहेत. विशेषतः आर्मी कॅम्पमधले प्रसंग, बीरोबरोबरचे प्रेमप्रसंग, मेलबर्नमधली नाचगाणी, छोटीसी लव्हस्टोरी हे सगळं आणखी कट-शॉर्ट करता आलं असतं, असं वाटत राहतं.
बिनोद प्रधान यांची सिनेमॅटोग्राफी आणि शंकर-एहसान-लॉय यांचं संगीत या दोन्ही गोष्टी सिनेमाच्या दर्जात भरच घालतात. विशेषतः मिल्खा व कोच रणबीरसिंग यांचे लडाखमधले प्रसंग अप्रतिम जमले आहेत. विशेषतः'जिंदा' हे गाणं जमलेलं.
अभिनयाबाबत बोलायचं तर फरहाननं हा सिनेमा खाऊन टाकलाय. त्याच्या या भूमिकेविषयी कितीही विशेषणं वापरली, तरी ती कमीच पडतील. मिल्खासिंग यांनी स्वतःच फरहानला 'तुझ्यात माझा भास होतो,' असं प्रमाणपत्र दिलंय. आता याहून मोठं बक्षीस काय हवं? फरहानला यंदा अभिनयाची बरीच अॅवॉर्ड मिळतील, यात शंका नाही. त्याची मेहनत प्रत्येक फ्रेममध्ये जाणवते. कायाकल्प वगैरे शब्द आपण नुसतेच ऐकतो. त्याचा अर्थ काय, हे पाहायचं असेल, तर या सिनेमातल्या फरहानकडं पाहावं. खास त्याच्या या रोलसाठी हा सिनेमा पाहायला हरकत नाही. बाकी सोनम कपूर, पवन मल्होत्रा, प्रकाश राज, योगराजसिंग यांनीही आपापली कामं छान केली आहेत. पाकिस्तानी अभिनेत्री मीशा शफीनं जलतरणपटू पेरिझादच्या छोट्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. मिल्खाच्या वडिलांच्या भूमिकेद्वारे हॉलिवूड कलाकार आर्ट मलिक यांनीही प्रथमच हिंदी चित्रपटात काम केलंय. विशेष उल्लेख करावा लागेल तो मिल्खाच्या बहिणीची भूमिका करणारी दिव्या दत्ता आणि छोट्या मिल्खाची भूमिका करणारा जपतेजसिंग यांचा.
तेव्हा मिल्खासिंग यांची ही प्रेरणादायी कथा नक्की पाहा. त्यांच्या प्रत्येक धावेच्या वेळी आपणच धावतोय असं वाटेल... जणू आपल्या रक्तातून, नसानसांतून ही धाव येतेय, असा फील येईल आणि आपल्याला आपलाच अभिमान वाटेल!
---

निर्मिती - राकेश मेहरा, व्हायाकॉम १८ मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक - राकेश ओमप्रकाश मेहरा
पटकथा-संवाद - प्रसून जोशी
संगीत - शंकर-एहसान-लॉय
सिनेमॅटोग्राफी - बिनोद प्रधान
प्रमुख भूमिका - फरहान अख्तर, सोनम कपूर, दिव्या दत्ता, पवन मल्होत्रा, योगराजसिंग, दलीप ताहिल, जपतेजसिंग, मीशा शफी, रिबेका ब्रीड्स आदी.
दर्जा - ****
---
(पूर्वप्रसिद्धी - मटा, पुणे - १३ जुलै १३)
----

6 Jul 2013

फर्स्ट डे फर्स्ट शो - लूटेरा

उत्कट प्रेमाचं रंगलेलं पान
--------------------------------



सध्याच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यात निवांतपणा कसा हरवून गेला आहे... आपलं प्रेम, राग, भांडणं, ब्रेक-अप हे सगळं कसं झटपट होत असतं... अशा या एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या सुपरफास्ट दशकात कुणी साठ वर्षांपूर्वीच्या शांत, निवांत आणि उत्कट प्रेमाची गोष्ट सांगू लागला तर...? विक्रमादित्य मोटवानी या दिग्दर्शकानं आपल्या लूटेरा या नव्या हिंदी चित्रपटात तेच केलंय... आणि खरं सांगू, धावपळीच्या आयुष्यातून एखाद्या सुशेगाद हिलस्टेशनवर वर्षभर राहायला जावं आणि बाहेर बर्फ भुरभुरत असताना, आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात सुंदर सुंदर पुस्तकं वाचत बसावं, असा अनुभव हा सिनेमा देतो. खरं प्रेम नक्की कसं असतं, याचा एक हळुवार प्रत्यय आपल्याला कानात गुज सांगावं, तसा देतो. सिनेमा संपल्यावर प्रत्येकाला आपल्या आयुष्यातल्या सर्वांत प्रिय व्यक्तीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. किंबहुना अशा व्यक्तीच्या हातात हात गुंफून पाहण्याचाच हा सिनेमा आहे. ओ. हेन्रीच्या द लास्ट लीफ या प्रसिद्ध कथेचा आधार या सिनेमाला आहे, हे सांगितल्यानंतर शीर्षकात रंगलेलं पान असं का म्हटलं आहे, हे लक्षात येईल. हे पान म्हणजे या सिनेमाचा प्राण आहे...
सिनेमाचा कालखंड आहे वर सांगितल्याप्रमाणं १९५३ चा. बंगालमधील माणिकपूर या गावातील जमीनदार रॉयचौधरी (वरुण चंदा) यांच्या प्रासादतुल्य हवेलीत कथा सुरू होते. रॉयचौधरी यांची एकुलती एक मुलगी पाखी (सोनाक्षी) तिच्या वडिलांसमवेत राहत असते. तरुण वयातच तिला दम्यासारख्या विकारानं ग्रासलेलं असतं. एक दिवस त्यांच्या हवेलीत पुरातत्त्व संशोधक असलेला तरुण वरुण (रणवीरसिंह) आणि त्याचा एक मित्र (विक्रांत मॅसी) येतात. चौधरीसाहेब त्यांना त्यांच्या इस्टेटीतील एका मंदिर परिसरात संशोधनासाठी खणण्याची परवानगी देतात. हळूहळू वरुण आणि पाखी यांचं प्रेम फुलू लागतं. त्यांचा वाङ्निश्चयही ठरतो.  मात्र, त्याच वेळी वरुणचा खरा चेहरा कळतो आणि एक धक्का देऊन मध्यंतर होतो. मध्यंतरानंतर गोष्ट डलहौसीला शिफ्ट होते. नायिकेचे वडील मरण पावले आहेत. ती आता एकटीच त्यांच्या डलहौसीतील आलिशान घरात राहतेय. वर्षभराचा काळ लोटलाय. आता नायक पुन्हा एकदा डलहौसीत तिच्या समोर येतो, पण सर्वस्वी वेगळ्या रूपात! विश्वासघातासारख्या कठोर प्रहारानं दुभंगलेली त्यांची मनं आणि आत कुठं तरी एकमेकांविषयीचं दडून बसलेलं खरं प्रेम यांची कसोटी आता सुरू होते...
विक्रमादित्यनं ही गोष्ट छान खुलविली आहे. साठ वर्षांपूर्वीचा कालखंड उभा करणं हे साधं काम नव्हे. मात्र, दिग्दर्शकानं सिनेमाचा पूर्वार्ध अतिशय रम्यपणे सादर केलाय. सिनेमाचा वेग या भागात अत्यंत हळूवार आहे. क्वचितप्रसंगी एवढा संथ सिनेमा आपल्याला चुळबूळही करायला भाग पाडतो. परंतु मध्यंतराला मिळणारा किंचित धक्का आणि त्यानंतर काहीसा थ्रिलर असा उत्तरार्ध यामुळं एकूण भट्टी पुन्हा जमून येते. चित्रपटातील हवेलीचं अंतर्गत चित्रिकरण, नायक-नायिकेची वेषभूषा, व्हिंटेज कार, चित्रकला शिकण्याचे प्रसंग या सर्वांतून दिग्दर्शक तो काळ जिवंत करतो. नायकाच्या खऱ्या रूपाविषयी एक सस्पेन्स त्यानं पहिल्यापासून कायम ठेवलाय. त्यामुळं मध्यंतराला बसणारा धक्का फारसा अनपेक्षित नसला, तरी या कथानकातून नायिकेविषयी पुरेपूर सहानुभूती निर्माण करण्यात दिग्दर्शक यशस्वी होतो. हा हळुवारपणा सिनेमातील कथावस्तूची प्रत काय पातळीवरची आहे, याची आपल्याला सातत्यानं जाणीव करून देत राहतो.
उत्तरार्ध काहीसा वेगवान आणि पळापळीचा आहे. तुलनेत नायक-नायिकेच्या पुनर्भेटीतून अपेक्षित असलेल्या प्रेमाच्या नव्या प्रत्ययाचा भाग कमी येतो. मात्र, याची सर्व कसर दिग्दर्शकानं क्लायमॅक्सच्या दृश्यांत भरून काढली आहे. या दृश्यामुळं सिनेमा उंची गाठतो. नायकाच्या मास्टरपीसबरोबरच दिग्दर्शकाच्या कारागिरीलाही आपण तिथं दाद देतो.
सोनाक्षीला तिची लाइफटाइम भूमिका मिळाली आहे. साठच्या दशकातील जमीनदार घराण्यातील अतिश्रीमंत; परंतु एकाकी नायिका पाखी तिनं समरसून साकारली आहे. कोपरापर्यंत लांब ब्लाउज आणि उंची साड्यांमध्ये ती दिसतेही छान. दम्यानं खंगलेली, विश्वासघातानं दुभंगलेली उद्-भवत पाखी तिनं उत्तरार्धात जबरदस्त साकारलीय. रणवीरनंही वरुणची वेगवेगळ्या छटा असलेली भूमिका अगदी जीव ओतून केलीय. उत्तरार्धातील त्याचे लूक अत्यंत प्रभावी. एकाच माणसात कधी कधी दोन टोकाचे स्वभाव असलेली व्यक्तिमत्त्वं वास करून असतात. अशा प्रकारची ही भूमिका रणवीरनं अगदी मेहनतीनं सादर केल्याचं जाणवतं.
संगीतकार अमित त्रिवेदी आणि गीतकार अभिजित भट्टाचार्य ही जोडी सध्या फॉर्मात आहे. त्रिवेदींचं संगीत खास. मोनाली ठाकूरच्या आवाजातलं संवार लूं... मैं संवार लूं हे गाणं यापूर्वीच हिट झालं आहे. ते छानच आहे. याशिवाय बाकी गाणी (मोंटा रे, शिकायतें.. इ.) चांगली जमली आहेत. सिनेमॅटोग्राफर महेंद्र शेट्टी यांच्या कॅमेऱ्यानं डलहौसीतील निसर्ग अप्रतिम टिपलाय.
या झक्कास सिनेमाविषयी तक्रार असलीच तर फक्त एकच. सिनेमाचं नाव एवढं खास नाही. किंबहुना बी ग्रेड मसाला हिंदी सिनेमाचं हे शीर्षक वाटतं. इतक्या काव्यात्म चित्रकादंबरीला तितकंच अभिजात शीर्षक असतं, तर छान वाटलं असतं. (अगदी ‘आखरी पन्ना’ हे भाषांतरित नावही चाललं असतं!) असो.
तेव्हा हा सिनेमा नक्की पाहा. हा गडबडगुंडा सिनेमा नाही. भरपूर, निवांत वेळ काढून जा... आणि आपल्या प्रिय व्यक्तीबरोबरच पाहा... प्रेम उत्कट असलं, की पान कसं रंगतं, याचा पुन्हा प्रत्यय येईल!
---
निर्मिती : बालाजी मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक : विक्रमादित्य मोटवानी
संगीत : अमित त्रिवेदी
सिनेमॅटोग्राफर : महेंद्र शेट्टी
प्रमुख भूमिका : रणवीरसिंह, सोनाक्षी सिन्हा, वरुण चंदा, विक्रांत मॅसी, अदिल हुसेन, चंदा, दिव्या दत्ता आदी.
दर्जा : ****
---
(पूर्वप्रसिद्धी - मटा, ६ जुलै, पुणे )
---

4 Jul 2013

फर्स्ट डे फर्स्ट शो - घनचक्कर





क्रेझी लॅड...


काही काही सिनेमे नक्की कोणत्या प्रकारात मोडतात, हे सांगणं काहीसं अवघडच. घनचक्कर या सिनेमाचा जॉनर सांगणं तसंच आहे. त्यातल्या त्यात कॉमेडीचा तडका मारलेला क्राइम थ्रिलर असं या सिनेमाचं वर्णन करता येईल. राजकुमार गुप्तानं या चित्रपटात गोष्ट सांगण्याची पद्धत नेहमीचीच ठेवली असली, तरी शेवट मात्र वेगळा केला आहे. मूल्यांच्या संदर्भात हा शेवट पारंपरिक चौकटीतलाच असला, तरी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या पारंपरिक चौकटीतला नक्कीच नाही. हे थोडं कोड्यातलं सांगणं होतं आहे. मात्र, सिनेमाचा रहस्यभेद करता येत नसल्यानं ही कोडवर्डी भाषा समजून घेता येईल, अशी आशा आहे.
संजय अत्रे (इम्रान हाश्मी) या मुंबईतल्या तरुणाच्या आयुष्यातल्या तीन महिन्यांची ही गोष्ट आहे. संजू व्यवसायाने तिजोरीफोड्या आहे. मात्र, त्यानं हा धंदा आता सोडून दिला आहे. असं असतानाही एक तोंडाला पाणी सोडणारी ऑफर त्याला आली आहे. ती पूर्ण केली तर त्याला किमान दहा कोटी मिळणार आहेत. पंडित व इद्रिस (राजेश शर्मा व नमित दास) या दोन चोरांच्या मदतीनं संजू ही कामगिरी फत्ते करतो. चोर तीस कोटींची बॅग संजूकडं ठेवायला देतात आणि तीन महिन्यांनी सर्व वातावरण शांत झाल्यावर त्याच्याकडं येऊन पैसे घेण्याचं ठरवतात. तीन महिन्यांनंतर चोर संजूला फोन करतात. मात्र, संजू त्यांना ओळखतच नाही. ते हादरतात. संजूला पकडून ठार मारायचा बेत आखतात. शेवटच्या क्षणी संजू त्यांना सांगतो, की त्याला अपघात झाल्यानं विस्मरणाचा आजार जडलाय. चोर हॉस्पिटलमध्ये जाऊन संजूला खरंच हा आजार झाल्याची खात्री करून घेतात. या आजारामुळं संजूला आपण पैशांची बॅग कुठं ठेवलीय हेच आठवत नसतं. या कथेत आणखी एक अत्रंगी पात्र आहे. ती म्हणजे संजूची पंजाबी, फॅशनवेडी बायको - नीतू (विद्या बालन). अखेर पैशांची वसुली करण्यासाठी चोर संजूच्याच घरी मुक्काम ठोकतात आणि त्याला सात दिवसांची मुदत देतात. त्यानंतर उडणारी पळापळ म्हणजे घनचक्कर.
हा प्लॉट तर मस्तच आहे. त्यात विनोदनिर्मितीच्या, फार्सच्या, रहस्याच्या, गुंतागुतीच्या  उपकथानकाच्या अनेक शक्यता दडल्या आहेत. राजकुमार गुप्तानं त्या सर्वच चाचपून पाहण्याचं ठरवलं आहे. सिनेमाच्या सुरुवातीलाच दाखवलेल्या काही दृश्यमालिकेत आणि त्या मालिकेच्या पुनरुक्तीत काही रहस्यं दडली आहेत. मुख्य पात्राला विस्मरण होणं ही बाब दिग्दर्शक त्याच्या हुशारीनुसार कशीही वापरू शकतो. राजकुमार गुप्तानंही ती हुशारी दाखविली आहे. संजूला काही गोष्टी आठवत असतात, तर काही आठवत नसतात. यामुळं संजूविषयी कायमच एक संशयाचं वातावरण प्रथमपासूनच निर्माण होतं. त्यात नीतूची पैशांची आवड आणि संजूचा जीवलग मित्र उत्तम (प्रवीण डबास) याचं एक उपकथानक गुंफून त्यानं संशयाची सुई आणखी काही पात्रांकडं वळविली आहे. ती बॅग कुठं गेली, हेच या सिनेमातलं मुख्य रहस्य असून, ते दिग्दर्शकानं शेवटपर्यंत चांगलं निभावलं आहे. विस्मरण झालेल्या नायकाचं आयुष्य दाखविण्यासाठी दृश्यमालिकांची पुनरुक्ती आणि काही दृश्यांची साखळी यांचा गोफ दिग्दर्शकानं बऱ्यापैकी विणला आहे. संजूचं घर आणि विरार फास्ट लोकल या सिनेमातल्या दोन महत्त्वाच्या नेपथ्यरचना आहेत. त्यातच बहुतांश घटना घडतात आणि रहस्याची उकलही यापैकी एका स्थळावरच होते. मधल्या काळात चोर आणि नीतू यांच्यातील काही विनोदी घटना दिग्दर्शकानं पेरल्या आहेत. त्यांचा रिलीफ म्हणून चांगला वापर होतो. संवाद अतिशय चटपटीत आणि दाद देण्याजोगे झाले आहेत. त्यातही जेवणाच्या टेबलवरचे संवाद आणि गजनीबाबतचा संवाद यांचा उल्लेख करता येईल.
सिनेमाचं संकलन अव्वल दर्जाचं आहे. विशेषतः क्लायमॅक्सच्या वेळी धावत्या रेल्वेचा वेग आणि डब्यात घडणाऱ्या घटनांचा वेग चांगला पकडला आहे.
इम्रान हाश्मीनं विसरण्याचा आजार जडलेला तरुण चांगला उभा केला आहे. अभिनेता म्हणून त्याच्यातली परिपक्वता वाढत चालल्याचं हे निदर्शक आहे. सदैव ताणाखाली वावरणारा, पण क्वचित स्वतःच्या वागणुकीबाबत संशय उत्पन्न करणारा संजू त्यानं ताकदीनं साकारला आहे. विद्या बालननं पंजाबी पत्नी नेहमीच्याच झोकात उभी केली आहे. फॅशनचं वेड असलेली, मासिकं वाचून त्याप्रमाणे कपडे घालणारी, सलवार-कमीजचा तिरस्कार करणारी, नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, वेळप्रसंगी चोरांना बडवून काढणारी तिची नीतू अतिशय गोड. या भूमिकेसाठी तिनं वाढवलेलं वजनही दिसत राहतं.
राजेश शर्मा आणि नमित दास यांच्या भूमिकाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. किंबहुना हाश्मी-बालन यांच्याएवढंच फुटेज या दोघांना आहे. त्यांनीही पंडित व इद्रिस ही दोन चोर पात्रं झकास उभी केली आहेत.
लेझी लॅड हे ममता शर्माचं गाणं यापूर्वीच लोकप्रिय झालं आहे. पण सिनेमात ते हाश्मी-बालन जोडीवर चित्रित झालेलं नाही, तर टायटल क्रेडिटला अॅनिमेशनवर येतं. तेवढी एक निराशा सोडली तर हा वेगळ्या पद्धतीचा थ्रिलर एकदा नक्की पाहायला हरकत नाही.

निर्मिती - यूटीव्ही मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक - राजकुमार गुप्ता
संगीत - अमित त्रिवेदी
प्रमुख भूमिका - इम्रान हाश्मी, विद्या बालन, राजेश शर्मा, नमित दास
दर्जा - ***

---
(पूर्वप्रसिद्धी - २९ जून, मटा, पुणे)