11 Apr 2026

वाराणसी-अयोध्या यात्रा - भाग ३

राम का गुणगान करिए...
------------------------------

५ एप्रिल २०२६, अयोध्या

आम्ही त्या मुख्य संकुलातून आत गेलो. आता मुख्य राम मंदिर अगदी समोर होतं. ते भव्य मंदिर आणि तिथलं अतिशय सुंदर प्रांगण बघून आनंद झाला. आमची रांग हळूहळू पुढं सरकत होती. पहिल्या पायरीला बहुतेक भाविक वाकून नमस्कार करत होते. मीही केला. एकेक पायरी चढताना आता मंदिराचं सर्व काम नीट दिसू लागलं. तिथले खांब, त्यावरचं कोरीव काम, विटकरी रंगाच्या त्या भिंती कमालीच्या सुंदर दिसत होत्या. एकेक पायरी चढून आम्ही मंदिराच्या मुख्य भागात प्रवेश केला, तेव्हा साधारण दोन्ही बाजूंनी चार-चार अशा आठ रांगा होत्या. स्टीलचे बार लावून रांग तयार  केली असल्याने एका वेळी एकच माणूस त्या रांगेत उभा राहू शकत होता. त्यामुळे रांग सुटसुटीत झाली होती व भराभर शिरत होती. जसजसे आम्ही मुख्य गाभाऱ्याच्या दिशेने जाऊ लागलो, तसतसा सर्व रांगांतून रामनामाचा मोठमोठ्यांदा गजर होऊ लागला. ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी तो परिसर दुमदुमून गेला. अगदी काही क्षणांतच आम्ही ‘रामलल्ला’च्या त्या भव्य मूर्तीसमोर होतो. २२ जानेवारी २०२४ रोजी टीव्हीवर पाहिलेली ती सावळ्यासुंदर बाल श्रीरामाची गोड मूर्ती आता अगदी समोर होती. मनोभावे दर्शन घेतलं. तिथं दोन महिला पोलिस उभ्या होत्या. त्या भाविकांना पुढं ढकलत होत्या. अर्थात रांग मागे बरीच होती. त्यामुळं आम्हीही केवळ क्षण-दोन क्षण समोर उभं राहून दर्शन घेतलं व पुढं सरकलो. जरा पुढं केल्यावर पुन्हा थोडं मागे येऊन परत एकदा डोळे भरून दर्शन घेतलं. तिथंही गर्दी व्हायला लागली तसं आणखी पोलिस आले आणि त्यांनी आम्हाला तिथून बाहेर जायला सांगितलं. एका मिनिटात आम्ही बाहेर होतो. पलीकडच्या बाजूने एक व्हीआयपी एंट्री असावी. शिवाय वरच्या मजल्यावर जाण्याचा रस्ताही तिथूनच होता. वर ‘राम दरबार’ होता, मात्र तिकडं काही आम्हाला जाता आलंच नाही. आम्ही बाहेर पडलो, ते थेट त्या संकुलातूनच बाहेर जाणाऱ्या रस्त्याने. तिथं एक जटायू प्रतिमा असं लिहिलेला बोर्ड होता. मात्र, ते काम पूर्ण व्हायचं असावं. अर्थात मंदिराचं काम करणाऱ्या एल अँड टी कंपनीला येत्या ३० एप्रिलपर्यंत सगळं काम संपवून बाहेर पडायला सांगितलं आहे, हे मी वाचलं होतं. मात्र, तरीही विस्तारासाठी बराच वाव ठेवल्याचं दिसलं. बाहेर पडल्यावर एक पाणपोई होती. तिथं बहुतेक जण पाणी प्यायला थांबले होते. उन्हामुळं तहान लागलीच होती. मीही तिथं जाऊन पाणी पिऊन आलो. इथून बाहेर जाण्याचा मार्गही वरून छत असलेला होता. त्यामुळं थेट उन्हाचा त्रास नव्हता. पुढे गेल्यावर डावीकडं लगेच स्वच्छतागृहही होतं. एकूण भाविकांच्या सोयीचा बराच विचार केलेला जाणवत होता. आम्ही पुढं जाऊन एका मोठ्या इमारतीत आलो. तिथंही बऱ्याच खुर्च्या होत्या. विमानतळावर किंवा रेल्वे स्थानकावर प्रतीक्षालय असतं, तसा तो हॉल होता. तिथं बरेच भाविक विश्रांती घेत होते. आम्ही फार दमलो नव्हतो. त्यामुळं लगेच लॉकरकडे गेलो. मगाशी समोरून वस्तू आत दिल्या होत्या, आता त्याच ठिकाणी मागील बाजूला असलेल्या खिडकीतून त्या परत घ्यायची सोय केली होती. हे फार चांगलं केलं होतं. वस्तू घेताना फार गर्दी नव्हती. त्यामुळं आमच्या वस्तू लगेच परत मिळाल्या. मग पुढं जाऊन चपलाही ताब्यात घेतल्या. तिथं एक मंडप टाकून सावलीची सोय केली होती. समोरच ‘सीता की रसोई भण्डार’ दिसलं. मग तिथं रांगेत उभं राहून द्रोणात गरमागरम खिचडी व ‘फ्रुटी’सारख्या पॅकिंगमधला ‘ओआरएस’चा पॅक घेतला. तो प्रसाद त्या मंडपात उभे राहूनच आम्ही खाल्ला. आपले लोक ते द्रोण तिथंच फेकत होते. वास्तविक तिथं प्लास्टिकची कचराकुंडी ठेवलेली होती. मात्र, लोक त्या कुंडीच्या खाली द्रोण फेकत होते. दोन बायका सतत ते झाडून तोच कचरा त्या कुंडीत टाकत होत्या. फार वाईट वाटलं ते दृश्य बघून. आपल्या लोकांना स्वच्छतेची ही बेसिक सवय कधी लागणार, राम जाणे!
तिथून बाहेर पडल्यावर लगेचच काही दुकानं होती. तिथं मग रामाचे धागे, फ्रिज मॅग्नेट, काही खाऊ अशी खरेदी केली. तिथं ‘बेंगलोर कॅफे’ दिसलं. मग वरच्या मजल्यावर जाऊन कोल्ड कॉफी घेतली. बरं वाटलं. आता आम्हाला हनुमान गढीला जायचं होतं. चालतच तिथपर्यंत गेलो. राम पथावर डाव्या बाजूला वळून छोट्या गल्लीतून आत जायचं होतं. रस्त्यावरूनच ती ‘गढी’ दिसत होती. इथं थोडं चढून जायचं होतं. खालपासूनच रांगेत गर्दी दिसत होती. आम्ही चपला खालीच एका दुकानदाराकडं काढल्या. वर जाऊ लागलो तसतशी गर्दी वाढू लागली. इथं राम मंदिराच्या अगदी उलट स्थिती होती. आत एक-दोन पोलिस होते; मात्र गर्दी त्यांच्याही नियंत्रणात नव्हती. अत्यंत रेटारेटीत कसंबसं बाजूनंच दर्शन घेऊन त्या रांगेतून बाहेर पडलो. पुन्हा प्रदक्षिणा मारून समोर आलो, तर तिकडं हनुमानाचं मुख आहे, हे कळलं. मग तिथूनच फोटो काढले व खाली उतरलो. मगाशी राम मंदिरात दर्शनाचा आलेला सुखद अनुभव आणि इथं हनुमान गढीला आलेला हा गर्दीचा अनुभव, अगदीच वेगळे होते.

खाली उतरून आता आम्हाला लता मंगेशकर चौकात जायचं होतं. मग मुख्य रस्त्यावर येऊन त्या गोल्फ कार्टमध्ये बसून आम्ही त्या भव्य वीणा असलेल्या चौकात गेलो. तिथं अपेक्षेप्रमाणे बरीच गर्दी होती. सगळ्यांना त्या वीणेबरोबर फोटो काढायचे होते. आम्हीही अर्थात काढले. (एक जाणवलेली गोष्ट म्हणजे त्या चौकात कुठेही लता मंगेशकरांच्या नावाचा फलक नव्हता. तो अयोध्येत इतरत्र एकदा दिसला. मात्र, त्या चौकात नव्हता.) तिथं उजव्या बाजूला रामकथा पार्क आणि डाव्या बाजूला राम की पैडी (पैडी की पौडी? पण तिकडं सगळीकडं ‘पैडी’ असंच लिहिलेलं होतं.) होती. रामकथा पार्क बंदच आहे, असं कळलं. तिथंच अलीकडं कोरियन राणी हो हिचं स्मारक दिसलं. तेही बांधकाम अपूर्ण होतं. मग आम्ही पुन्हा त्या ‘पैडी’कडं आलो. तिथं पाण्याच्या दोन्ही बाजूला चांगलं घाटासारखं बांधकाम केलं होतं. पाणी अगदीच घोटाभर होतं. त्यातून लोक इकडून तिकडं चालत जात होते. तिथं सुरुवातीलाच एक पाणीपुरी विकणारा मुलगा होता. मग आम्ही तिथं पाणीपुरी खाल्ली. शेजारी एक स्पेशल चहा देणारं दुकान होतं. त्या दुकानदारानं गुलाब पाकळ्या टाकून उकळलेला फर्मास चहा आम्हाला दिला. मजा आली. पुढं त्या भागाच्या दुसऱ्या टोकापर्यंत आम्ही चालत गेलो. तिथं एक लेसर शो होता. त्याआधी आम्ही पुढं शरयूच्या घाटावर गेलो. तिथं आरती सुरू होती. गर्दीही भरपूर होती. इथल्या नदीत खाली उतरायला नीट सोय नव्हती. मातीचा निसरडा उतार होता. त्यामुळं आम्ही खाली न जाता वरूनच तो सोहळा पाहिला. परत आलो, तर तो लेसर शो सुरू झाला होता. हरीश भिमानींच्या आवाजातलं निवेदन होतं. पाण्यापलीकडं असलेल्या इमारतींवर प्रकाशझोत टाकून हा शो दाखवला जात होता. मात्र, त्याचे स्पीकर लोक जिथं बसले होते, त्याच्यामागे होते. त्यामुळं नीट ऐकू येत नव्हतं. याशिवाय त्या परिसरात इतरत्र लाउडस्पीकर सुरू होते. ते आवाज मिक्स होत होते. त्यामुळं शो चांगला असूनही आम्हाला जरा बोअर झाला. मग आम्ही तिथून उठून आलो. पुन्हा ती चार सीटर ई-रिक्षा करून हनुमान गढीच्या बाजूला आलो. या रिक्षावाल्यांना बहुतेक त्या राम पथावरून जाण्याची परवानगी नाही. मग त्यानं समोरच्या लखलखत्या धर्म पथावरून एका बोळात रिक्षा घातली. बरंच फिरवून फिरवून त्यानं आम्हाला त्या राम पथाच्या बाजूच्या गल्लीत सोडलं. जाताना जुन्या अयोध्या गावाचं दर्शन घडलं. हे गाव इतर चार गावांसारखंच साधं होतं. 
आता आम्हाला दशरथ महाल, कनक भवन बघायला जायचं होतं. पुन्हा हनुमान गढीच्या बाजूनं पुढं गेलो. तिथंच तो दशरथ महाल होता. बाहेरचा दर्शनी भाग भव्य होता व तिथं बरीच लायटिंगही केलेली होती. आतमध्ये बरीच मोकळी जागा होती व पुढं मंदिर होतं. इथं त्या मूर्तींपुढं प्रत्यक्ष कीर्तनासारखं भजन वगैरे सुरू होतं. भाविकांची गर्दीही बरीच होती. तिथं थोडा वेळ थांबून मग चालतच शेजारच्या कनक भवनात गेलो. ही वास्तू म्हणे कैकेयीने सीतेला भेट दिली होती. इथंही साधारण तसंच चित्र होतं. त्या इमारतीचा दर्शनी भाग भव्य होता. शेजारी एक महादेवाचं देऊळ होतं. आत गेल्यावर मोकळी जागा व पुढं मंदिर. त्या वेळी नेमका त्या मूर्तींसमोर पडदा ओढला होता. हा ‘शयन समय’ एक तास होता असं कळलं. त्यानंतरच मूर्ती दिसणार होत्या. आम्हाला तेवढा वेळ नव्हता. बाहेर पडलो. त्या मोकळ्या जागेत एक छोटी देवळी होती. तिथं ‘भरताच्या पादुका’ होत्या असं समजलं. इथं जे दिसेल त्याला आणि चार लोक करतील त्याला नमस्कार करणे हे धोरण मी ठेवलं होतं. त्यानुसार तिथंही त्या पादुकांवर डोकं टेकवून आलो. इथं भिंतींवर बऱ्याच ठिकाणी ‘सीताराम’ अशी अक्षरं कोरली होती आणि बरेच भाविक ती अक्षरं येता-जाता गिरवत होते. विशेषत: महिला! यामागचं लॉजिक काही कळलं नाही. सीतेचं नाव रामाआधी घेतलं जातं, यासंबंधीची एक लोककथा पूर्वी ऐकली होती. आता आठवत नाही. त्याचा काही संदर्भ असू शकेल.
इथून निघालो. आता बराच उशीर झाला होता. आमच्या हॉटेलच्या गार्डन रेस्टॉरंटमध्ये जेवायचं आमचं ठरलं होतं. मग रिक्षा करून हॉटेलवर गेलो. तिथं रेस्टॉरंटला भरपूर गर्दी होती. गार्डन रेस्टॉरंटला फारसं कुणी बसलं नव्हते. तिथले दिवेही सुरू नव्हते. बाहेर भरपूर डास होते. त्यामुळं लोक बाहेर का बसले नसावेत, ते कळलंच. आम्हीही मग आत बसूनच जेवलो. रूमवर येऊन झोपलो. मात्र, ‘रामलल्ला’चं सुखद दर्शन झाल्यामुळं मन अगदी तृप्त होतं!

६ एप्रिल २०२६, अयोध्या/वाराणसी

आज आमच्यापैकी वृषाली काही कामानिमित्त इथूनच इंदूरला व तिथून पुण्याला परत जाणार होती. ब्रेकफास्ट केल्यांतर तिची कॅब आली. तिला बाय बाय करून आम्हीही थोड्या वेळाने पुन्हा राम मंदिर परिसरात निघालो. आमचं ‘चेक आउट’ ११ वाजता होतं. त्यामुळं बॅगा तिथंच ठेवून आम्ही बाहेर पडलो. राम मंदिर परिसरात जाऊन परत थोडी फार खरेदी केली. काल दशरथ महालाकडं जाताना ‘राम - भरत मिलाप’ अशी काही तरी पाटी बघितली होती. त्या छोट्याशा मंदिरात गेलो. तिथल्या पुजारीबुवांनी एकूणच आमच्याविषयी खूपच ममत्व दाखवलं. आम्ही एक किलो शिधा (किंमत फक्त ५०० रुपये) ठेवावा, असा एकूण त्यांचा आग्रह दिसला. आम्ही प्रत्येकी शंभर रुपये दिले व तिथून सुटका करून घेतली. बाहेर आलो तर ‘६ डी’ शोचा बोर्ड दिसला. तिथं एक मुलगा खाली रस्त्यावरच त्या ‘शो’ची जाहिरात करत होता. आधी डेमो पाहा; मग आवडला तरच तिकीट काढा, म्हणाला. आम्ही ते टेकाड थोडं चढून गेलो. तिथं एका काचेच्या मोठ्या खोलीत काही लोक त्या ‘व्हीआर’ इक्विपमेंटमधून शो पाहत होते. आम्हाला त्याने डेमो दिला. आम्हा तिघांनाही आवडला. मग प्रत्येकी दीडशे रुपयांचे तिकीट काढून आम्ही ‘अयोध्या व दीपोत्सव’ हा दहा-बारा मिनिटांचा शो निवडला. (तिथं वेगवेगळ्या देवस्थानांचे असे शो होते व ते साधारण याच कालावधीचे होते.) शो चांगला होता. थ्री डी इफेक्टमुळे अयोध्येतली वेगवेगळी ठिकाणं नीट बघता आली. हनुमान गढीवरचा हनुमान आम्हाला प्रत्यक्ष दर्शनाच्या वेळी दिसला नव्हता, तो इथं नीट दिसला. एकूण मजा आली. हा शो संपल्यावर समोरच असलेल्या राजद्वार मंदिरात गेलो. अयोध्या नरेशांनी सुमारे पाचशे वर्षांपूर्वी हे मंदिर बांधलं आहे. इथं रामाचा दरबार अशा स्थितीत सुंदर मूर्ती आहेत. या मंदिराचा कळस अयोध्येत सर्वांत उंच आहे. तिथं पुजारी म्हणून एक बाई होत्या. त्यांच्या परवानगीने मूर्तींचे फोटो काढले. तिथं थोडा वेळ बसलो. नंतर खाली येऊन त्या राम पथावर पुन्हा जरा भटकंती केली, राहिलेली खरेदी केली. तिथं उडुपी ते मुंबई रेस्टॉरंट होतं. ते आम्ही जातानाच हेरून ठेवलं होतं. मग तिकडंच जेवायला गेलो. रसम भात आणि रवा डोसा घेतला. तो भात भरपूर आला. त्यात माझं व साईचं पोट भरलंच. तिथून आम्ही थेट रिक्षा करून हॉटेलला गेलो. त्याला सांगितलं, की आम्हाला तिथून रेल्वे स्टेशनला सोड. मग हॉटेलला जाऊन बॅगा उचलल्या व थेट स्टेशनला गेलो. आमची ‘वंदे भारत’ साडेतीन वाजता होती. आम्ही दोन वाजताच स्टेशनला पोचलो होतो. मग त्या वरच्या प्रतीक्षालयात जाऊन बसलो. तासभर टाइमपास केला. तिथं माकडं भरपूर येत होती. आमच्याकडं खायचं काही नसल्यानं नंतर ती दूर गेली. साडेतीनला आम्ही खाली फलाटावर आलो. ट्रेन वेळेत आली. आमच्या डब्यात मराठी बोलणारे १५-१६ जण होते. त्यांच्यातल्या एक मावशी आमच्याशेजारीच आल्या. चौकशी केली तर त्यांचं माहेर जामखेडचं निघालं. छोटंसं जग! 
गाडी वेळेत निघाली, पण मधे लटकली. कुठं तरी ट्रॅकला आडव्या जाणाऱ्या रस्त्याचं काम सुरू होतं म्हणे.  त्यामुळं आमची गाडी एक तास एकाच जागी थांबली. त्यामुळं सव्वासहाला पोचणारी गाडी जवळपास सात वीसला वाराणसी स्टेशनला पोचली. मग तिथून पुन्हा रिक्षा करून हॉटेलला गेलो. साडेआठ वाजले होते. आम्हाला खरेदीसाठी आजचाच दिवस होता. मग लगेच आवरून बाहेर पडलो. काशी विश्वेश्वराच्या रस्त्याने पुढं गेलो. जाताना अदितीनं  (जोगळेकर) सांगितलेला तो ‘सरदारजी पापडवाले’ दिसला. मग तिथं जाऊन पापड आणि मिरचीचं लोणचं (अदितीचीच शिफारस) घेतलं. पुढं बनारसी फॅक्टरी साड्या थेट विकणारं एक छोटेखानी दुकान दिसलं. मग तिथून साड्या व जास्त करून ड्रेस मटेरियलची खरेदी झाली. मला काहीच घ्यायचं नव्हतं. हे होईपर्यंत दहा वाजले होते. मग जरा पुढं गेल्यावर ‘फुलवारी’ नावाचं एक हॉटेल आतल्या बाजूला दिसलं. एका वाड्यातच मधल्या मोकळ्या जागेचा वापर करून केलेलं ते घरगुती हॉेटेल आम्हाला आवडलं. तिथलं जेवणही चांगलं होतं. महत्त्वाचं म्हणजे आम्हाला स्टीलची ताटं दिली होती, ते आवडलं. जेवून मग बाहेर आलो. तिथं एक रिक्षावाला दिसला. त्याला आमच्या हॉटेलला यायला तयार केलं. थोड्या वेळात हॉटेलला पोचलो. भरपूर दमलो होतो. लगेच झोप आली.

७ एप्रिल २०२६, वाराणसी/पुणे

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्हाला मृत्युंजयेश्वराच्या मंदिरात जायचं होतं. हे आमच्या हॉटेलपासून चालत जाण्याच्या अंतरावर होतं. मग तिकडं गेलो. एवढ्या सकाळीही त्या मंदिरात बरीच गर्दी होती. ते मंदिरांचं एक संकुलच होतं. मग तिथल्या सर्व महादेवांचं, तिथल्या त्या पवित्र पाण्याच्या कुंडाचं दर्शन घेऊन परतलो. येताना आम्ही पहिल्या दिवशी जिथं हिंग कचौडी खाल्ली होती, तिथं जाऊन साईलाही ती खाऊ घातली. त्यानं आमच्या हॉटेलसमोरची ती बागही बघितली नव्हती. मग येताना त्या बागेतून हॉटेलला आलो. तोवर आमच्या हॉटेलमधल्या ब्रेकफास्टची वेळ झाली होती. ब्रेकफास्ट भरपेट केला. आम्हाला अकरा वाजता हॉटेल सोडायचं होतं. मग मी ‘ओला’वरून कॅब बुक केली. ती दहा मिनिटांत आली. चेक-आउट केलं. जाताना कॅबवाल्यानं वाराणसी कँटोन्मेंट परिसरातून गाडी नेल्यानं तोही परिसर बघता आला. साधारण ५० मिनिटांत आम्ही विमानतळावर पोचलो, तेव्हा बरोबर ११.३० झाले होते. आमचं फ्लाइट १.४५ वाजता होतं. मग विमानतळावर टाइमपास केला. सिक्युरिटीत आमचं मिरचीचं लोणचं अडकलं. केबिन बॅगेत मिरची कुठल्याच फॉर्ममध्ये चालत नाही, हे ज्ञान प्राप्त झालं. (चेक-इन बॅगेत चाललं असतं म्हणे. असो.) नाइलाजानं ती बाटली तिथंच सोडली. आमचं गेट पहिल्या मजल्यावर होतं. तिथं एक सुंदर वॉल डिझाइन होतं. मी व साईनं तिथं फोटो काढून घेतले. आमचं गेट आधी ४ नंबरचं होतं. मग ते ६ नंबरला गेलं. मग आमची पालं उठून तिकडं जाऊन बसली. विमान फक्त पाच मिनिटं लेट होतं. मात्र, बरोबर दोन वाजता आम्ही उड्डाण केलं. पुण्यात पहिल्या झटक्यात परवानगी मिळाली नाही. ‘गो अराउंड’ करायला लागलं. त्यामुळं ‘टच्ड डाउन’ला सव्वाचार वाजले. बाहेर येऊन एअरोमॉलला आलो. कॅब आलीच होती. कॅबवाल्याशी कॅश की डिजिटल पेमेंट यावरून किरकिर झाली आणि आपण पुण्यात येऊन पोचल्याची खात्री पटली. साईच्या घरी आमची गाडी ठेवली होती. स्वत:च्या गाडीत बसलो आणि बरं वाटलं. एसी फुल्ल ऑन करून साडेसहाला सुखरूप घरी येऊन पोचलो. 
वाराणसी व अयोध्या ही भारतातली दोन प्रमुख तीर्थस्थळं बघायची खूप दिवसांपासूनची इच्छा अशी पूर्ण झाली होती. काळभैरवनाथाच्या मंदिरात गळ्यात अचानक पुजाऱ्यानं घातलेला हार, नावेत बसल्यावर गंगेच्या पाण्याला झालेला पहिला स्पर्श, काशी विश्वेश्वराचं आणि अयोध्येत ‘रामलल्ला’चं डोळे भरून झालेलं दर्शन, काशी हिंदू विश्वविद्यालयाची ओझरती का होईना, पण झालेली भेट... अशा काही ठळक आठवणी फेर धरून मन:पटलावर दिसत राहिल्या. प्रत्येक प्रवास तुम्हाला काही तरी देतोच. आपण तिथून आल्यानंतर आधीचे राहत नाही. आपल्या धारणा बदलतात, आपण बदलतो! अधिक उदारमतवादी होतो, अधिक शांत होतो... गोष्टी ‘लेट गो’ करायला शिकतो... गंगा व वाराणसीच्या भेटीनंतर तर मला माझ्यातलं ‘भारतीयत्व’ अधिक फुलून आल्याचं फीलिंग आलं आहे. म्हणजे नक्की काय, ते नाही सांगता येणार... गंगेच्या अखंड वाहत्या दिव्य प्रवाहासारखी ही भावनाही पुढल्या आयुष्यभर मनात प्रवाहित होत राहणार एवढं मात्र नक्की!

(समाप्त)

---

10 Apr 2026

वाराणसी-अयोध्या यात्रा - भाग २

ओम नमो गंगायै...
---------------------


४ एप्रिल २०२६, वाराणसी

त्या पायऱ्या उतरून खाली आलो, तर समोर गंगेचं विशाल पात्र. वास्तविक आत्ता एप्रिल महिना असल्यानं हे पाणी कमी होतं. पात्र निम्मं कोरडं होतं. तरीही जी नदी वाहत होती ती पुष्कळ रुंद व मोठीच होती. त्यातून मोठमोठ्या नौका, यॉट सहज ये-जा करत होत्या. त्या गंगादर्शनानं मन संतुष्ट झालं. ‘राम तेरी गंगा मैली हो गयी पापीयों के पाप धोते धोते...’ हे खरं असलं, तरी गंगेचं पावित्र्य व माहात्म्य अबाधित आहे. श्रद्धाळूंसाठी गंगा ही आपले सर्व अपराध पोटात घेणाऱ्या आईसारखी देवी आहे, यात शंका नाही. आम्ही ज्या घाटावर पोचलो, तो शिंदे (सिंधिया) घाट होता. इथं फारशी गर्दी नव्हती. गर्दी असणारे मणिकर्णिका, दशाश्वमेध वगैरे घाट आमच्या उजव्या बाजूला होते. आमच्याकडं वेळ होता. त्यामुळं आत्ताच गंगेतून सैर करावी, असं ठरलं. अभि व शुभम म्हणाले, की इथल्या नावाड्यांशी आम्ही बोलतो. मग त्यांनी त्यांच्या खास ‘यूपी’ भाषेतून नावाड्याशी सौदा ठरवला आणि आम्ही त्या छोट्याशा होडीत बसलो. आम्ही सहा जण होतो. सगळ्यांनी ती लाइफ जॅकेट्स घातली. सीएनजीवर चालणारी ती होडी लगेच उजव्या बाजूला वेगात जाऊ लागली. आम्ही आमच्या उजव्या हाताला वाराणसीचे ते प्रसिद्ध घाट बघू लागलो. काय बघू आणि अन् काय नाही, असं होऊन गेलं. इतके दिवस केवळ माहितीपटांत, सिनेमांत बघितलेले ते भव्य घाट, तिथली जुनी मंदिरं, त्यांचे कळस, सर्वत्र फडफडणारे भगवे झेंडे, किनाऱ्यावर उभ्या असलेल्या रंगबिरंगी होड्या, घाटांवर लगबगीने धावणारे पुजारी किंवा पंडे, त्यांच्या मागोमाग धावपळ करणारे भाविक, अधूनमधून ऐकू येणारा घंटानाद, दक्षिण भारतीय भाषांपासून ते थेट जपानी, चिनी वा कोरियन भाषांत रंगवलेले फलक, अतिशय मजबूत बांधकाम असणारे व किल्ल्यासारखे भासणारे दरभंगा घाटासारखे अचाट घाट, मणिकर्णिका व हरिश्चंद्र घाटावर सतत जळणारी प्रेतं, त्या आगीच्या लोळांतून डोळ्यांत घुसणारे ‘मृत्यू हेच शाश्वत सत्य’ यासारखे विचार, काशीला गंगेकाठी मरण म्हणजे थेट मोक्ष मानणारी व जुन्या काळी इथं येऊन खरोखरच मृत्यूला कवटाळणारी किती तरी भोळीभाबडी माणसं... सिनेमातली दृश्यं सरकावीत, तशी पुढं जाणाऱ्या होडीबरोबर उजव्या बाजूला ही सगळी दृश्यं काही प्रत्यक्ष, तर काही मन:पटलावर तरळून जात होती. आम्ही गंगेत हात बुडवत होतो, ते पाणी हाताला, डोक्याला, डोळ्यांना लावत होतो. त्या थंडगार पाण्याच्या स्पर्शातून आपली सगळी आदिम संस्कृतीच कडकडून भेटायला आली आहे, असं काहीसं वाटून गेलं.
गंगेकाठी एकूण १०४ घाट आहेत. आम्ही त्यातले ५०-६० तरी पाहिले असावेत. अर्थातच नदीतून, धावते असे. बरंच पुढं जाऊन होडीनं यू-टर्न घेतला. दुपारची वेळ असली, तरी सुदैवानं ढगाळ वातावरण होतं. अनेक मोठमोठ्या नौकांतून बरेच भाविक, पर्यटक गंगाविहार करत होते. एखादी होडी जवळून गेली, की ‘हर हर महादेव’, ‘जय भोलेबाबा की’ अशासारखे गजर उठत होते. प्रत्येकाचा चेहरा गंगास्पर्शानं झालेल्या आनंदानं उजळून निघाला होता. आमच्या मित्रांनी नावाड्याला आम्हाला ‘गायघाट’ इथं सोडायला सांगितलं होतं. आम्ही जिथून होडीत बसलो, तिथून पुढं डावीकडं हा घाट होता. त्यामुळं आम्हाला बरीच मोठी चक्कर मिळाली. अखेर आम्ही गायघाट इथं उतरलो. मन आनंदानं भरून गेलं होतं. अनेक वर्षं जी कामना केली होती, ती आज देवाच्या कृपेनं फळाला आली होती. गंगेत घोडं न्हालं एकदाचं!


आता असं ठरलं, की हॉटेलवर जाऊन थोडी विश्रांती घेऊ या आणि दुपारी तीननंतर पुन्हा फिरायला बाहेर पडू या. आम्ही हॉटेलकडं चालत जाताना एके ठिकाणी लस्सी दिसली. आम्हाला भूक लागलीच होती. मग ती मोठा वाडगाभर लस्सी सगळे प्यायलो. अप्रतिम अशी ती लस्सी प्यायल्यावर आमची भूक पूर्ण गेली. आता हेच जेवण असं सगळ्यांनाच वाटून गेलं. तिथून रिक्षा करून हॉटेलवर गेलो. तासभर आराम केला. दुपारी साडेतीन वाजता पुन्हा आमचे मित्र हॉटेलवर आले, मी त्यांना आधीच सांगितलं होतं, की मला बनारस हिंदू विश्वविद्यालय (बीएचयू) बघण्यात अधिक रस आहे. शिवाय तिथंही काशी-विश्वेश्वराचं आणखी एक मंदिर आहे, हे माहिती होतं. तेही बघता आलं असतं. ते बघून पुन्हा गायघाटावर येऊन, गंगेची आरती बघायची असं ठरलं. मग आम्ही सरळ एक कॅब बुक केली. ‘बीएचयू’चं अंतर बरंच, म्हणजे दहा किलोमीटरहून जरा अधिक दाखवत होतं. आम्हाला वाटलं होतं, की आम्ही पाऊण तासात पोचू. मात्र, वाराणसीच्या भयंकर ट्रॅफिकमुळं आम्हाला जवळपास एक ते सव्वा तास लागला. आम्ही तिथं पोचलो, तोवर पाच वाजून गेले होते. जाताना रस्त्यानं रोप-वेचं काम चालू असलेलं दिसलं. इथल्या रेल्वे स्टेशनपासून ते काशी-विश्वनाथ मंदिरापर्यंत हा रोप-वे तयार करण्यात येत आहे. त्यामुळं शहरातल्या वाहतुकीवरचा ताण जरा हलका होईल. आम्ही ‘बीएचयू’च्या प्रवेशद्वारावर पोचलो, तेव्हा दारातच पं. मदनमोहन मालवीय (या विद्यापीठाचे संस्थापक व थोर विद्वान) यांचा पूर्णाकृती पुतळा दिसला. समोर तपकिरी व पिवळसर रंगसंगतीची विद्यापीठाची स्वागत कमान दिसली. त्यावरची ‘काशी हिन्दू विश्वविद्यालय’ हे शब्द व त्याचं लेटरिंग मला फार आवडलं. मला चंद्रमोहन कुलकर्णी यांची आठवण झाली. त्यांनी अशा वैशिष्ट्यपूर्ण लेटरिंगवर, वळणदार अक्षरांवर ‘मटा संवाद’मध्ये एक सदरच लिहिलं होतं, ते आठवणं स्वाभाविक होतं. थोड्या वेळानं आमची कॅब त्या मंदिरासमोर थांबली. इथंही पर्यटकांची भरपूर चहलपहल होती. अर्थात हे मंदिर आधुनिक होतं आणि तुलनेनं गर्दी सुसह्य होती.
आम्ही आत जाऊन शांतपणे ते मंदिर बघितलं. इथं मोबाइल न्यायला परवानगी होती. त्यामुळं भरपूर फोटो काढले. इथल्या महाविद्यालयांच्या इमारतीही देवळाच्या कळसासारख्या आकाराच्या बांधल्या आहेत. हे विद्यापीठ बघण्याचं आणखी एक कारण म्हणजे प्रा. जयंत नारळीकर. नारळीकरांचे वडील रँग्लर विष्णू नारळीकर या विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते. त्यामुळं नारळीकरांचं शालेय जीवन याच विद्यापीठीत व्यतीत झालं. ‘मला लहानपणी मराठीपेक्षा हिंदी चांगली बोलता यायची,’ असं त्यांनी ‘चार नगरांतले माझे विश्व’ या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकात लिहिलं आहे. या चार नगरांतलं एक नगर अर्थातच बनारस होतं. नारळीकरांनी त्या दिवसांचं मोठं मनोज्ञ वर्णन या पुस्तकात केलं आहे. तेव्हापासून मला हे विद्यापीठ पाहायचं होतं. अर्थात ही फारच धावती भेट होती व विद्यापीठाच्या आवारात केवळ मी जाऊन आलो. पण ‘दुधाची तहान ताकावर’ याप्रमाणे मी मनाचं समाधान करून घेतलं.
आता आम्हाला भूक लागली होती. मंदिराच्या बाहेर खाण्याचे स्टॉल होते. तिथं वडापावही मिळत होता. मग आम्ही सगळ्यांनीच तोच घेऊन खाल्ला आणि मग अर्थातच ‘कुल्हड’वाला चहा घेतला. त्यामुळं जरा तरतरी आली. मग पुन्हा कॅब करून ‘गायघाट’ला निघालो. येताना लागलं त्याहून दुप्पट ट्रॅफिक जाताना लागलं. त्यामुळं साडेसातची आरती मिळते की नाही, असं वाटून गेलं. आम्हाला त्या घाटावर पोचायला बराच उशीर झाला. जवळपास सव्वाआठ वाजत आले होते. आम्ही मगाशी इथं येऊन गेलो होतो, त्यामुळे रस्ता माहीत होता. आम्ही पळतच घाटावर निघालो. आमचे मित्र त्यांच्या दुचाकीवरून कधीच घाटावर येऊन बसले होते. आम्ही पायऱ्या उतरत असतानाच मंत्रपुष्पांजली ऐकू आली. मला वाटलं, संपली आरती. आता काही बघायला मिळत नाही. मात्र, आम्ही पोचलो तेव्हा आणखीही मंत्र, आरत्या सुरू झाल्या. त्यामुळं आम्हाला निदान तो भाग तरी बघायला मिळाला. या घाटावर तुलनेनं गर्दी कमी असते. मात्र, नदीतून नौकेत बसून समोरून आरती बघण्याची आमची संधी हुकली. आरती झाल्यावरही आम्ही तिथं जरा रेंगाळलो. तिथं अनेक जण ते दिवे सोडत होते. साई व वृषालीनं आधी तिथून तो एक दिवा विकत घेऊन नदीत सोडला. मग आम्हीही सोडला. गंगेवरून येणाऱ्या वाऱ्यामुळं तिथं बसायला छान वाटत होतं खरं... पण आता आम्हाला भूक पण लागली होती आणि बाजारपेठेत जरा चक्करही मारायची होती. मग तिथून चालत निघालो सगळे. आमच्या मित्रांना आम्हाला प्रसिद्ध काशी चाट भांडारमध्ये न्यायचं होतं. पण तिथं जाईपर्यंत बराच उशीर झाला. मग खरेदीचा मोह टाळून थेट तिकडंच गेलो. जाताना पायाचे तुकडे पडले. काशी-विश्वेश्वराच्या त्या रस्त्यावर फक्त त्या गोल्फ कार्टसारख्या संस्थानच्या गाड्या चालतात. रिक्षांना रात्री १२ नंतरच तिकडून जायला परवानगी आहे. तिथला तो प्रसिद्ध चौक ‘रोप-वे’चं काम सुरू असल्यानं आणखी अरुंद झाला होता.

त्या चाट भांडारच्या दुकानासमोर ही गर्दी होती. आम्हाला वाटलं, की बहुतेक परत जावं लागणार. मात्र, थोड्या वेळात आम्हाला चक्क आत बसायला जागा मिळाली. मग तिथं बसून भरपेट पोटपूजा केली. टमाटर चाट ही तिथली स्पेशालिटी. त्यानंतर आलू टिक्की, फालुदा असं एकेक मागवून हाणलं. भरपूर झालं. आता आम्हाला खरेदीचाही उत्साह नव्हता आणि चालायचाही. मग आमच्या या मित्रांनी चक्क जुगाड करून दोन दुचाकीवाल्यांना पटवलं. ते खरोखर रायडर होते की असेच होते, कुणास ठाऊक. पण त्यांनी आम्हाला चक्क ट्रिपल सीट नेऊन हॉटेलला सोडलं. शंभर रुपयांत फक्त. आम्ही एवढे दमलो होतो, की कसंही करून हॉटेलला पोचायचं होतं. सहज बघितलं तर दिवसभरात आम्ही १५ हजारहून अधिक पावलं चाललो होतो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला अयोध्येला जायचं होतं. त्यामुळं आमच्या मित्रांचे आभार मानून, आम्ही त्यांना निरोप दिला आणि रूमवर जाऊन ढाराढूर झोपलो.

रामजन्मभूमीकडे....

५ एप्रिल २०२६, वाराणसी/अयोध्या

सकाळी लवकर उठून आवरलं. ब्रेकफास्ट करून चेकआउट केलं. हॉटेलवाल्याला स्टेशनला सोडायला रिक्षा मागवायला सांगितल्या. इथल्या मुख्य रेल्वे स्टेशनला वाराणसी कँटोन्मेंट असं नाव आहे. आमच्या तिकिटावर लिहिलं होतं, की ‘वंदे भारत’ला फक्त वाराणसी जंक्शन इथूनच बसता येईल. आमच्या मित्रांनी आम्हाला कालच सांगितलं होतं, की इथं त्या स्टेशनला ‘कैंट’ म्हणतात, तर तुम्ही तसंच सांगा. वाराणसी सिटी नावाचंही एक मोठं स्टेशन आहे. आता नवोदित माणसाचा नक्कीच गोंधळ होईल, अशीच ही माहिती होती. अखेर आम्ही स्टेशनची खात्री करून रिक्षात बसलो. दोन्ही रिक्षांनी आम्हाला वीस मिनिटांत स्टेशनवर सोडलं. हे स्टेशन भव्य होतं. आमची ट्रेन सात नंबरच्या फलाटावर लागली होती. मग आम्ही सामान घेऊन ब्रिजवरून तिकडं गेलो. ही गाडी इथूनच सुटत असल्यानं ती फलाटावर उभीच होती. इथून ती मेरठला जाते. साधारण ८०० किलोमीटरच्या अंतरात मध्ये फक्त पाच की सहा स्टेशनं घेते. इथून निघाली, की अडीच तासांनी पहिला स्टॉप अयोध्या धाम हाच होता. गाडी वेळेत निघाली. साधारण ११० किलोमीटर ताशी हा सर्वोच्च वेग तिनं काही वेळा गाठला. मला उत्तर प्रदेशचा बराच मोठा भाग या प्रवासात बघायला मिळाला. सगळा सपाट मैदानी प्रदेश. अनेक ठिकाणी धान्य काढून त्याच्या पेंड्या रचून ठेवल्या होत्या. सगळीकडं कडक उन्हामुळं एक पिवळट-मातकट रंग पसरला होता. ‘वंदे भारत’मध्ये आम्ही एसीत बसलो होतो. बाहेर मात्र रणरणतं ऊन होतं. छोटी छोटी गावं लागली. बाहेर एवढ्या उन्हातही क्रिकेट खेळणारी मुलं... एखाद्या मोठ्या झाडाला पार, त्यावर बसलेले वृद्ध... सगळी घरं विटांची आणि बाहेरून प्लास्टर न करण्याची पद्धत, त्यामुळं त्या विटा अशा उघड्या दिसणाऱ्या... अशीच सगळी एक मजली किंवा जास्तीत जास्त दुमजली घरं. दोन्ही बाजूंनी असाच अफाट व सपाट पसरलेला हा उत्तर प्रदेश! हिंदी हार्टलँड... अनेकदा ‘गायपट्टा’ म्हणून हिणवला जाणारा. मात्र, अगदी पूर्वी ‘स्टार प्लस’वरच्या ‘क्यूं की साँस भी कभी बहू थी’ या आणि अशा अनेक हिंदी मालिकांचा लाखोंच्या संख्येत असलेला ‘कोअर’ प्रेक्षक असलेली ही भूमी. आमच्या प्रवासात जौनपूर हे एकच मोठं शहर लागलं. बाकी छोटी गावं. बऱ्याच गावांची नाव जफराबाद वगैरे मुस्लिम वळणाची. अयोध्येपर्यंतचं १९० किलोमीटरचं अंतर आमच्या ‘वंदे भारत’नं अडीच तासांत कापलं. सकाळी ९.१० ला निघालेली गाडी बरोबर ११.४० वाजता ‘अयोध्या धाम’ असं नव्यानं नामकरण झालेल्या (माझ्या माहितीनुसार आधी या स्टेशनचं नाव फैजाबाद होतं...) त्या भव्य स्थानकात पोचली. गाडीला ठरलेल्या वेळेपेक्षा फक्त सहा मिनिटं उशीर झाला होता.

इथं स्टेशनची रचना वैशिष्ट्यपूर्ण होती. स्टेशनच्या दोन्ही फलाटांना धरून वरच्या बाजूला पहिल्या मजल्यावर मोठं प्रतीक्षालय व त्यावर मोठा डोम असं बांधलं होतं. आम्ही सरकत्या जिन्यानं वर गेलो. ते भव्य प्रतीक्षालय ओलांडून पलीकडच्या बाजूनं सरकत्या जिन्यानं खाली उतरलो व स्टेशनबाहेर आलो. वृषालीनं कॅब बुक केली होती. सात नंबरच्या गेटपाशी या असं त्यानं सांगितलं. तिकडं गेलो, तर तिथं बऱ्याच कॅब उभ्या होत्या. सुदैवानं आमची कॅब लगेच सापडली. इथून आम्ही बुक केलेलं ‘हॉटेल पंचशील’ सहा किलोमीटरवर होतं.
अयोध्या शहराच्या दिशेनं गाडी निघाली. भगभगत्या उन्हात ते मध्यम आकाराचं गाव अगदीच साधं वाटलं. पूर्वी तर फैजाबाद व अयोध्या ही दोन्ही गावं फारच बकाल होती, असं अनेकांकडून ऐकलं होतं. आता मात्र रस्ते एकदम चांगले दिसले. आमचं हॉटेल हायवेच्या बाजूलाच होतं. तिथं पोचलो तेव्हा फक्त सव्वाबारा वाजले होते. आमचं ‘चेक-इन’ एक वाजता होतं. मात्र, तिथल्या लोकांनी औपचारिकता पूर्ण करून आम्हाला लगेचच खोल्या ताब्यात दिल्या. आम्हाला भूक लागली होती. या हॉटेलच्या प्रांगणात त्यांचंच एक चांगलं गार्डन रेस्टॉरंट होतं. मग तिथं गेलो. हॉटेलमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. अगदी पुण्यात आल्यासारखं वाटलं. जेवण ठीकठाक होतं. पुन्हा अयोध्येत आल्यासारखं वाटलं. नंतर बिल आल्यावर पुन्हा पुण्यात आल्यासारखं वाटलं. असा लंचचा सी-सॉ खेळून झाल्यावर आम्ही तिथूनच बाहेर पडलो. आता श्रीरामजन्मभूमी तीर्थाकडं जाऊन ‘रामलल्ला विराजमान’चं दर्शन घेण्याची अतिशय उत्सुकता होती. आम्ही बाहेर येऊन कॅब बुक करायला लागलो. मात्र, दुपारी दोनच्या त्या रणरणत्या उन्हात एकही कॅबवाला येईना. मग पुन्हा हॉटेलमध्ये येऊन तिथल्या ‘ट्रॅव्हल डेस्क’वर आमच्यासाठी कॅब बुक करायची विनंती केली. त्याने एक हजार रुपये होतील, असं सांगितल्यावर ‘धन्यवाद’ म्हणून पुन्हा बाहेर आलो. आमच्या हॉटेलपासून रामजन्मभूमी तीर्थ सहा-साडेसहा किलोमीटर होतं. त्यामुळं जास्तीत जास्त दोनशे ते अडीचशे रुपये व्हायला हवे होते. अखेर एक कॅब बुक झाली. तो कॅबवाला चांगला होता. जाताना बरीच माहिती त्यानं दिली. अयोध्येचं बदललेलं रूप जाणवत होतं. उत्तम, रुंद रस्ते, आकर्षक पथदिवे, चित्रांनी सजलेल्या भिंती असं सगळं नवं कोरं होतं. थोड्याच वेळात आम्ही टेढी बाजार नावाच्या चौकात येऊन पोचलो. इथून पुढं कॅब वा रिक्षा जात नाही. इथून पुढं संस्थानच्या गोल्फ कार्टसारख्या गाड्याच आत जातात. तिथून रामजन्मभूमी तीर्थाच्या प्रवेशद्वारापर्यंत २० रुपये तिकीट होतं. आम्ही त्या कार्टमध्ये बसून पाच मिनिटांत त्या प्रवेशद्वारापाशी पोचलो. जाताना दोन्ही बाजूंनी विविध दुकानं आणि भाविकांची वाढती गर्दी दिसू लागली. त्या ट्रस्टच्या भव्य कार्यालयाच्या दारात आम्ही उतरलो. ‘जगद्गुरू श्रीरामानन्दाचार्य द्वार’ असं लिहिलेल्या प्रवेशद्वारातून आत गेलो. आम्ही कुठलंही ऑनलाइन बुकिंग केलं नव्हतं. ‘थेट जा, काही प्रॉब्लेम नाही,’ असं बऱ्याच जणांनी सांगितलं होतं. तरी त्या ट्रस्टच्या कार्यालयात ‘स्वागत कक्षा’त जाऊन मी चौकशी करून आलो. तिथं फक्त व्हीलचेअर हवी असेल तर नाव नोंदवायची व्यवस्था आहे. बाकी लॉकर, चपला ठेवायची जागी वगैरे सर्व पुढं आहे, असं सांगण्यात आलं. मग आम्ही बाहेर येऊन रांगेला लागलो. इथं रांगेवर छत बांधलेलं असल्यानं उन्हाचा त्रास नव्हता. स्टीलचे बार उभे करून रांगा केल्या होत्या. त्यामुळं रांग अस्ताव्यस्त होत नव्हती. ही सर्व व्यवस्था अतिशय समाधानकारक होती. रांगेत थोडं पुढं गेल्यावर समोरच राम मंदिराच्या मुख्य कळसाचं व धर्मध्वजाचं दर्शन झालं आणि मन प्रसन्न झालं. उन्हाचा सगळा ताप गेला. ‘अनुदिनी अनुतापें तापलो रामराया’ ही भावना एकदम नष्ट झाली. अंगात वेगळाच उत्साह संचारला. तिथून साधारण ७०० मीटर अंतरावर आत डाव्या बाजूला बूट-चपला ठेवायची जागा होती. तिथं एका पिशवीत आपापल्या चपला वा बूट ठेवून कुपन घ्यायचं होतं. उन्हामुळं पाय पोळू नयेत म्हणून तिथं कार्पेट टाकण्यात आले होते. त्यामुळं पाय भाजत नव्हते. तिथून मग समोरच्या मोठ्या इमारतीत असलेल्या लॉकरच्या रांगेत उभे राहिलो. इथंही काय आता नेता येतं व काय नेता येत नाही याच्या स्पष्ट सूचना देणारे फलक व्यवस्थित लावले होते. त्यानुसार मोबाइल, स्मार्ट वॉच, कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण आत नेता येत नाही. याउलट पैसे, वॉलेट, छोटी पर्स, पारंपरिक घड्याळ, बेल्ट हे सगळं चालत होतं. या इथे मात्र बरीच मोठी रांग होती. सिंगल लाइन करताना आम्हाला बरीच यातायात करावी लागली. लोक ऐकत नव्हते. बेशिस्तीचं दर्शन घडत होतं. अज्ञानामुळं काहींचा वेळ जात होता. मात्र, ही तपश्चर्या पार पाडून आम्ही एकदाचे त्या मुख्य संकुलाकडं निघालो. आता ‘रामलल्ला’चं दर्शन काही मिनिटांतच होणार होतं... ज्यासाठी हा सगळा अट्टाहास केला तो क्षण असा जवळ येऊन ठेपला होता... १९९२ पासूनच्या सगळ्या घटना डोळ्यांसमोरून तरळून गेल्या. त्रेतायुगात १४ वर्षं वनवास सोसाव्या लागलेल्या श्रीरामाला कलियुगात मात्र पाचशे वर्षांचा वनवास सोसावा लागला होता... तो वनवास २२ जानेवारी २०२४ रोजी संपला होता. त्या दिवसापासून इथं येण्याची आस मनात बाळगली होती. त्या स्वप्नपूर्तीचा क्षण जवळ येत चालला होता... डोळे रामाच्या त्या बालकरूपाचं दर्शन घ्यायला आतुर झाले होते...

(क्रमश:)

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-----



-----------



9 Apr 2026

वाराणसी-अयोध्या यात्रा - भाग १

काशीस जावे, नित्य वदावे...
---------------------------------


३ एप्रिल २०२६, पुणे/वाराणसी


सर्व भारतीयांप्रमाणे आपणही कधी तरी काशीला (म्हणजेच वाराणसी किंवा बनारसला) जावे, गंगा पाहावी, विश्वनाथाचे दर्शन करावे अशी माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. मात्र, देवस्थानांबाबत माझा अनुभव असा आहे, की तुमचा योग यावा लागतो. आपण घोकून काहीही होत नाही. त्यामुळं मी शांतपणे या योगाची वाट पाहत राहिलो. पत्रकारितेत येऊन आता मला जवळपास तीन दशकं झाली. भारताच्या राजकारणात उत्तर प्रदेशचं महत्त्व वेगळं सांगायला नको. गंगा-यमुनेच्या खोऱ्यांत पसरलेला हा विशाल भूभाग म्हणजे खरा भारत, असं अनेक ठिकाणी वाचलं होतं. अनुभवलंही होतं. ‘यूपी नहीं देखा तो क्या इंडिया देखा?’ अशी (जरा आढ्यतेखोर वाटणारी) जाहिरात ‘यूपी टुरिझम’ करतं. अर्थात त्यात तथ्य आहेच. भारताबाहेरच्या अनेक लोकांना भारत म्हणजे ‘ताजमहाल, काशीचे घाट, गंगा, त्रिवेणी संगम’ हेच वाटतं. त्यात महाराष्ट्रासह संपूर्ण दक्षिण भारत अनेकदा नसतोच. अर्थात ‘गंगा’ म्हणजे भारताची ‌ठ‌ळक ओळख. शिवाय काशी-रामेश्वर या नात्याने दक्षिण भारतीय मंडळीही काशीस येतच असतात. महाराष्ट्राचं आणि काशीचं नातंही फार जुनं. तिथले अनेक घाट अहिल्याबाईंनी, शिंद्यांनी, भोसल्यांनी बांधले. तिथले अनेक धर्मपंडित इकडून तिकडे गेले. तिकडूनही इकडं आले. आपली मुळं, आपला डीएनए एकच आहे, हे वेगळं सांगायचीही गरज नाही. त्यामुळं गंगा पाहणं, दोन की तीन हजार की किती तरी जास्त वर्षांहून अधिक काळ भारतीय संस्कृतीचे साक्षीदार असलेले तिथले ते घाट पाहणं, तब्बल साडेतीन हजार मंदिरं असलेली सर्वांत प्राचीन नगरी वाराणसी तिथल्या त्या तितक्याच प्राचीन गल्ली-बोळांतून फिरून प्रत्यक्ष अनुभवणं हे सगळं ‘बकेट लिस्ट’मध्ये होतं. ‘काशीस जावे नित्य वदावे’ असं आपण म्हणतो. तसं मी जाहीरपणे नाही, पण मनातल्या मनात कितीदा तरी घोकत होतो. आग्रा व ताजमहाल पूर्वीच बघून झाला. त्या अर्थानं उत्तर प्रदेशाला पाय लागले होते. मात्र, वाराणसी, प्रयागराज, लखनौ, कानपूर, अयोध्या, गोरखपूर ही उत्तर प्रदेशातली ‘कोअर’ शहरं पाहिल्याशिवाय आपण खरा भारत पाहिला, असं मला तरी काही वाटत नव्हतं. पत्रकारितेत असताना निदान निवडणुका कव्हर करण्यासाठी तरी या राज्यात जावं, असं अनेकदा वाटलं. मात्र, तोही योग काही आला नाही. अखेर या इच्छेनं तीव्र उचल खाल्ली ती दोन वर्षांपूर्वी २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत ‘रामलल्ला’ विराजमान झाले, तेव्हापासून! अयोध्या ही तर गेल्या तीन दशकांतल्या सर्वांत धगधगत्या मुद्द्याची केंद्रबिंदू नगरी होती. मी तो सर्व काळ वृत्तपत्राच्या कार्यालयांतून पाहिला होता. बातम्या केल्या होत्या. अखेर करोडो भारतीयांच्या स्वप्नांची पूर्तता २२ जानेवारी २०२४ रोजी झाली होती आणि बहुतांश भारतीयांत असतं तसं माझ्यातही लपून असलेलं एक ‘भाबडं हिंदू मन’ उचंबळून आलं. रामाला त्रेतायुगात १४ वर्षांचा वनवास झाला; मात्र कलियुगात तो पाचशेहून अधिक वर्षांचा झाला आणि अखेर त्याला त्याचं न्याय्य ‘घर’ मंदिराच्या रूपानं मिळालं, ही बहुतांश भारतीयांप्रमाणे माझीही भावना होती व आहे. पत्रकार म्हणून अयोध्या पाहण्याची उत्सुकता होतीच; पण त्याहून अधिक ओढ माझ्यातल्या ‘भाबडं हिंदू मन असलेल्या भाविका’ला लागली होती. सुदैवानं मंदिरात रामलल्ला विराजमान झाल्या झाल्या पुढच्याच महिन्यात माझ्या आई-वडिलांना अयोध्येला जाण्याची संधी मिळाली. त्यामुळं आता मी जायला अगदी सज्ज झालो होतो. अर्थात अयोध्येत एवढी कामं सुरू होती, की ती संपूर्ण झाल्यावरच आपण जावं, असंही एक व्यावहारिक मन सांगत होतं. अखेर (वयाची पन्नाशी उलटून गेल्यावर) फेब्रुवारीत आमचं अयोध्या व वाराणसीला जायचं ठरलं. आमचे नेहमीचे साथीदार - माझा आत्येभाऊ साईनाथ व त्याची पत्नी वृषाली - आणि आम्ही दोघं - मी व धनश्री - असं चौघांनी जायचं ठरलं. आमची मुलं येणारी नव्हती. त्यांच्या परीक्षा असणार होत्या. परीक्षा झाल्यावर त्या दोघांना (हवं तिथं!) आम्ही ट्रिपला जाऊ देऊ, या अटीवर मुलांनी आम्हाला सोडलं. अर्थात आता आमची ट्रिप तशी सुटसुटीत झाली. मग फेब्रुवारीच्या मध्यालाच आधी विमानाचं बुकिंग करून टाकलं. (तेव्हा आखाती युद्धाचं काहीही वारं नव्हतं.) आता पुण्याहून वाराणसीला ‘इंडिगो’ची थेट फ्लाइट आहे आणि ती फार सोयीची आहे. दोन तासांत थेट वाराणसीला पोचता येतं. तीन ते सात  एप्रिल अशी पाच दिवस ट्रिप ठरली. आधी अयोध्या व वाराणसीच्या जोडीला प्रयागराजही ठरवत होतो; पण ते वेळापत्रकात बसेना. मग फक्त अयोध्या व वाराणसी करू या, असं ठरवलं.
पंधरा दिवसांपूर्वी साईनाथनं दोन्ही ठिकाणची हॉटेल्स बुक केली. वाराणसीवरून अयोध्येला जाण्यासाठी खासगी कॅब करण्यापेक्षा ‘वंदे भारत’ सोयीची आहे, असं संशोधनाअंती समजलं. मग मी त्या ट्रेनचं जातानाचं व येतानाचं बुकिंग करून टाकलं. युद्ध सुरू झाल्यानंतर आपल्या इथल्या विमान प्रवासावर काय परिणाम होतोय, अशी जरा धाकधूक होती. तसं थोडं झालंच. आमच्या जातानाच्या फ्लाइटची वेळ बदलून अलीकडं आली. आधी रात्री ११.४० ला निघणारी ही फ्लाइट दुपारी पावणेपाचला झाली. अर्थात हे सोयीचं झालं. मध्यरात्री वाराणसीला पोचण्यापेक्षा आता आम्ही संध्याकाळ पावणेसातला पोचणार होतो हे बरंच झालं. ठरल्याप्रमाणे तीन तारखेला दुपारी आम्ही निघालो. फ्लाइट वेळेत होती व वेळ‌ेत पोचली. मी डाव्या बाजूला खिडकीशी बसलो होतो. वाराणसीच्या अलीकडं लँडिंगच्या पंधरा मिनिटं आधी एकदम गंगा दिसली. काही हजार फूट उंचीवरूनही आणि काहीशा धुरकट वातावरणातूनही गंगेचं ते विशाल पात्र पाहून मन एकदम रोमांचित झालं. ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ अशी उन्मनी अवस्था झाली. मी तरीही पटकन मोबाइल काढून त्या भव्य पात्राचं चित्रीकरण केलं. (हे चित्रीकरण पाहण्यासाठी येथे क्लिक करा...) थोड्याच वेळात अगदी वाराणसी शहर व गंगेचे ते घाटही दिसू लागले. विमान वळताना पुन्हा गंगेचं दर्शन घडलं. फारच छान वाटलं. पुढच्या पाच मिनिटांत आमच्या विमानानं वाराणसीच्या विमानतळावर ‘टच्ड डाउन’ केलं.
मी ‘मेकमायट्रिप’वरून आदल्या दिवशी कॅब बुक केली होती. तिथं ‘विवेक दीक्षित’ असं नाव आल्यावर मी हसून म्हटलं, की ड्रायव्हरचं नाव बघा. वेलकम टु यूपी! अर्थात यूपीत पोचल्यावर कळलं, की हे त्या मालकाचं नाव आहे. प्रत्यक्ष ड्रायव्हर कुणी दुसराच होता. त्यातही आधी एका ड्रायव्हरचा फोन आला. त्यानं आमच्याकडं चार बॅगा आहेत म्हटल्यावर ट्रिप कॅन्सल केली. मग बहुतेक दीक्षितजींनी (जे अर्थात मालक होते) हा दुसरा पाठवला होता म्हणे. मला आधी त्याचं नाव शर्मा वाटलं. पण तो ‘राजेश विश्वकर्मा’ निघाला. हा ड्रायव्हर हुशार होता व बहुतेक ड्रायव्हर असतात तसा बडबड्या होता. आमच्या वृषालीला नेहमी चहा हवा असतो. मलाही हवा असतो म्हणा. मग विमानतळावर ‘काशी का स्वाद’ नावाचं एक छोटेखानी रेस्टॉरंट दिसलं. तिथं गेल्यावर चहा १०० रुपये म्हटल्यावर आम्ही बाहेरच आलो. ड्रायव्हर राजेशला आमची फजिती सांगितल्यावर तो हसला आणि रस्त्यात थांबून आपण चहा घेऊ म्हणाला. वाराणसीचा हा ‘लाल बहादुर शास्त्री अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा’ तसा पुण्याच्या विमानतळापेक्षाही लहान होता. मात्र, टुमदार होता. तिथं प्रांगणातच शास्त्रीजींचा ब्राँझचा भव्य पुतळा आणि तिरंगा आहे. आम्ही त्याच पुतळ्याच्या खाणाखुणा सांगत कॅबपर्यंत पोचलो होतो. हा विमानतळ बाबतपूर नावाच्या गावात आहे. तो वाराणसीपासून जवळपास ३० किलोमीटर दूर आहे. त्यामुळं मधे थांबून चहा घेणं आवश्यकच होतं. मग विमानतळाबाहेर पडल्या पडल्या लगेच डाव्या हाताला काही टपरीवजा छोटी हॉटेलं लागली, तिथं आमच्या ड्रायव्हरनं कार थांबविली. संध्याकाळचे सात-सव्वासात झाले होते. मात्र, या दिवसांत आपल्याकडं जसा उजेड असतो, तसं तिकडं नसतो. वाराणसी पुण्यापासून ईशान्येला जवळपास १३०० किलोमीटरवर आहे. त्यामुळं त्या संधीप्रकाशापेक्षाही जरा अंधारच पडलेल्या वेळेला आम्ही ‘कुल्हड’मधून झकास चहा घेतला. राजेशभाईला पण दिला. मग त्यानं तिथून आमची कॅब भरधाव शहराच्या दिशेनं सोडली. थोड्याच वेळात आम्हाला एक फ्लायओव्हर लागला. उजवीकडं लखनौ (२८१ किलोमीटर) व डावीकडं वाराणसी (२२ किलोमीटर) होतं. तो फ्लायओव्हर बराच मोठा होता. वाराणसीत मी यापूर्वी कधी आलो नव्हतो. त्यामुळ‌ं आधी इथं कसा रस्ता होता, हे मला ठाऊक नव्हतं. मात्र, ड्रायव्हरच्या मते ही सगळी सुधारणा आत्ताची, गेल्या दहा वर्षांतली आहे. त्या भल्या मोठ्या फ्लायओव्हरवरून दीर्घकाळ प्रवास केल्यावर आम्ही वाराणसी शहरात प्रवेश केला. तिथंही नवं शहर व जुनं शहर असे दोन भाग आहेतच. आमचं ‘आनंद काशी’ हे हॉटेल काशी विश्वनाथ मंदिरापासून जेमतेम दोन किलोमीटरवर, अर्थात जुन्या शहराच्या मध्यभागी होतं. त्यामुळं कॅब जसजशी जुन्या शहराकडं जाऊ लागली, तसतसं ट्रॅफिक वाढलं. अरुंद रस्ते, भरपूर वाहनं आणि कर्कश्श वाजणारे हॉर्न हे उत्तर भारतातल्या बऱ्याच शहरांत दिसणारं दृश्य तिथंही दिसू लागलं. राजेशभाई म्हणाले, ‘यहाँ ऐसाही होता है!’ आम्ही ‘बरं’ म्हटलं. दुसरं काय म्हणणार होतो? त्या ट्रॅफिकपुढं मला पुण्यातलं ट्रॅफिक फारच शिस्तबद्ध व कमी हॉर्न वाजवणारं वाटायला लागलं. अखेर जवळपास दीड तासानं, म्हणजे साडेआठच्या सुमारास आम्ही त्या हॉटेलमध्ये पोचलो. ते हॉटेल अगदीच जुन्या भागात वसलं होतं. आत जायला एक रॅम्प होता. तिथून कार वर गेली ती थेट रिसेप्शनच्या लॉबीतच जाऊन उभी राहिली. तिथले कर्मचारी लगेच सामान उतरवून घ्यायला तत्परतेनं धावले. पाच मिनिटांत सर्व सोपस्कार करून आम्ही खोल्या ताब्यात घेतल्या. सुदैवानं त्या तळमजल्यावरच होत्या. आम्ही अजिबात फारसे दमलेले नव्हतो. त्यामुळं लगेच आवरून बाहेर पडावं आणि काळभैरवनाथाचं दर्शन घ्यावं असं ठरलं. माझा मेव्हणा हर्षद नेहमी काशीला सहली घेऊन जातो. त्यानं सांगितलं होतं, की हा काळभैरवनाथ म्हणजे काशीचा कोतवाल आहे. त्याचं आधी दर्शन घ्यायचं व मगच ‘काशी विश्वनाथा’ला जायचं. आमच्या हातात वेळ होता व ते मंदिरही तिथून जवळच होतं, म्हणून मग आम्ही तिकडं निघालो.
आम्ही पाच मिनिटांत तिथं पोचलो. तिथं सरळ जाणारा मार्ग बंद केला होता आणि तिथं उभे असणारे पोलिस दुसरीकडून जा, असं सांगत होते. मग आम्ही त्या चौकातच एका दुकानात चपला काढल्या आणि चालत त्या रस्त्याने निघालो. रस्ते म्हणजे सगळे गल्ली-बोळच होते. काशीचा हा अगदी जुना भाग होता. अगदी लागून लागून असलेली घरं, मधून जाणारा बोळवजा रस्ता, तिथं दुचाकी गाड्यांची बेशिस्त ये-जा, जोरजोरात हॉर्न वाजवणं, स्थानिक विरुद्ध पर्यटक यांच्यातली वादावादी, मधेच गोमातांची ये-जा हे सगळं बघून आम्ही तर भेदरूनच गेलो. तरीही आम्ही त्या लाइनीचं शेवटचं टोक शोधलं व तिथं उभे राहिलो. सुमारे दीड तास त्या रांगेत अशक्य असा वैताग सहन केल्यावर आम्हाला ते काळभैरवनाथ मंदिर दिसलं. मला एकदम लक्षात आलं, की आज गुड फ्रायडे, उद्या शनिवार, रविवार. म्हणजे लाँग वीकएंड... त्यामुळंच तिथं एवढी प्रचंड गर्दी झाली होती. त्यात आमच्यासारखे बाहेरच्या राज्यातून आलेले पर्यटक तर होतेच; पण उत्तर प्रदेशच्या अन्य भागांतून एक किंवा दोन दिवसांसाठी काशी दर्शनाला आलेलेही कित्येक लोक होते. आमची वेळ चुकली होती. अर्थात एवढ्या तपश्चर्येनंतर काळभैरवनाथाचं मनोभावे दर्शन झालं. मी जरा वाकून नमस्कार करत होतो तोवर तिथल्या पुजाऱ्याने तिथं पडलेला एक गुलाबाचा हार माझ्या गळ्यात घातला. शिवाय आणखी एक तुळशीचा हारही दिला. मला खूप आनंद झाला. एवढा वेळ रांगेत थांबल्याचं चीज झालं असं वाटलं. जणू हा प्रसादच! मग बाहेर येऊन मी तो तुळशीचा हार धनश्रीच्या गळ्यात घातला व आमचा फोटो काढून घेतला. नंतर तेच हार साई व वृषालीला दिले आणि त्यांचेही फोटो काढले. आमच्या चपला ठेवल्या होत्या ते दुकानदार दुकान बंद करून गेले होते. दुकानाच्या पायऱ्यांशी आमच्या व इतरही भाविकांच्या चपला तशाच लोळत पडल्या होत्या. त्या घेतल्या आणि निघालो. आता जवळपास दहा वाजून गेले होते. भूक लागली होती. त्याच गल्लीत एक ‘अन्नपूर्णा कॅफे’ नावाचं छोटेखानी हॉटेल दिसलं. तिथं आत बेसमेंटमध्ये काही पर्यटक जेवताना दिसले. मग आम्हीही तिथं गेलो. नंतर लक्षात आलं, की एक बाई, तिचा नवरा व त्यांचा अगदी पाच-सहा वर्षांचा छोटा मुलगा मिळून ते हॉटेल चालवत आहेत. बाकी स्टाफ कुणीच नव्हता. त्या बाई अगदी साध्या होत्या. त्या कुणालाच नाही म्हणत नव्हत्या. सगळ्यांच्या ऑर्डर घेत होत्या. आम्ही ऑर्डर दिल्यावर आमच्या हे लक्षात आलं. पण आता पर्याय नव्हता. वरच्या बाजूला किचन होतं. तिथून कधी त्या, तर कधी नवरा त्या डिशेस खाली घेऊन येत होते. तो लहान मुलगाही बिचारा सतत धावपळ करत होता. आम्हाला तिथून उठून जावंसंही वाटेना. ती फॅमिली गरजू वाटत होती. मग आम्ही प्रचंड भूक लागली असूनही संयमाने आमची डिश येण्याची वाट पाहिली. ती ठीकठाक होती; पण अत्यंत भूक लागल्यानं तीही गोडच मानून घेतली. तिथून निघून चालत परत हॉटेलवर आलो. 

४ एप्रिल २०२६, वाराणसी

दुसऱ्या दिवशी आता मुख्य सोहळा म्हणजे काशी-विश्वनाथाचं आणि अर्थात गंगेचं दर्शन. सकाळी उठल्यावर शॉवरमधून आलेल्या गंगेत स्नान केलं. आम्ही लवकर उठलो होतो. आमच्या हॉटेलच्या बरोबर समोर एक पार्क होतं. मग धनश्री व मी तिथं चक्कर मारायला गेलो. पार्क छोटेखानी होतं, पण चांगलं होतं. मधोमध एक तळं होतं. त्यात कारंजं होतं. आजूबाजूला ‘नगर निगम, वाराणसी’नं छोटेखानी जिम, जॉगिंग ट्रॅक वगैरे सोयी केल्या होत्या. तिथं भरपूर लोक सकाळी चालायला आले होते. आम्ही पार्कच्या दुसऱ्या बाजूला गेलो, तेव्हा त्या पार्कचं नाव ‘भारतेंदू हरिश्चंद्र पार्क’ असं आहे, हे दिसलं. हे हिंदी साहित्यातलं व रंगभूमीवरचं मोठं नाव. त्यांना आधुनिक हिंदी साहित्य व रंगभूमीचे जनक मानलं जातं. (सन १८५० मध्ये जन्मलेल्या हरिश्चंद्रांना अवघं ३४ वर्षांचं आयुष्य लाभलं. मला आपल्या राम गणेश गडकऱ्यांची आठवण झाली.) तिथं त्यांचा पूर्णाकृती पुतळाही होता. मग आम्ही पार्कच्या दुसऱ्या बाजूने काशी विश्वनाथाकडं जाणाऱ्या चौकाकडं आलो. तिथं रस्ते बंद केलेले दिसले, तेव्हा कळलं, की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काशी विश्वनाथाच्या दर्शनाला येत आहेत. थोड्याच वेळात त्यांचा ताफा तिथून गेला. मग रस्ते मोकळे झाले. त्या चौकात शास्त्रीजींचा पांढरट अर्धपुतळा होता. त्याची इतकी दुरवस्था झाली होती, की विचारू नका. खरं तर हे शास्त्रीजींचं गाव. इथं विमानतळाला त्यांचं नाव आहे आणि तिथं व इतरत्रही त्यांचे अनेक पुतळे आहेत. पण या चौकातल्या पुतळ्याकडं काही कुणाचं लक्ष नव्हतं. असो.

तिथंच कोपऱ्यात अनेक स्टॉल होते. तिथं ‘मामा की हिंग कचौडी’ असा एक स्टॉल दिसला. मग आम्ही एक कचौडी घेतली. मटार उसळीसारख्या हिंग घातलेल्या खमंग सरसरीत मिश्रणात ती कचौडी कुस्करून देत होते. एका कचौडीनं मन तृप्त झालं. मग शेजारीच ‘कुल्हड’मधला चहा घेतला. परत पार्कमधून चालत हॉटेलवर आलो. आमच्या हॉटेलमध्ये आमचा ब्रेकफास्ट होता. तो इतर सर्व हॉटेलमध्ये असतो तसाच होता. त्यात इडलीपासून पराठ्यापर्यंत आणि वेगवेगळ्या फळांपासून ते चहा-कॉफीपर्यंत सगळं काही होतं. मग रीतीप्रमाणं तो ब्रेकफास्ट केला. इथं आम्हाला आमचे दोन स्थानिक मित्र भेटणार होते. अभि व शुभम अशी त्यांची नावं. ते थोड्याच वेळात आमच्या हॉटेलवर आले. ते इथलेच राहणारे होते. त्यामुळं पुढचा सर्व दिवस त्यांच्याबरोबरच आम्ही फिरणार होतो. मग आम्ही लगेच चालत चालत काशी विश्वनाथाच्या दर्शनाला गेलो. त्या मगाच्या चौकापासून पुढं ऑटो रिक्षा किंवा मोठ्या वाहनांना परवानगी नाही. ट्रस्टच्या गोल्फ कार्टसारख्या गाड्या येतात. मात्र, त्यांची वाट न पाहता आम्ही सकाळच्या वेळेत तिकडं चालत निघालो. शनिवारचा दिवस होता. त्यामुळं रस्त्यावर भाविकांची भरपूर गर्दी होतीच. बरंच चालल्यावर आम्ही गेट नं. ४ ला पोचलो. इथं शिवमच्या ओळखीच्या एका पोलिस अधिकाऱ्यामुळं आम्हाला पास मिळाला होता. त्यांनी एका कॉन्स्टेबलचा नंबर दिला होता. मग त्याने आम्हाला फोन करून एका ठिकाणी बोलावलं, तिथं आमच्यासारख्या ‘प्रोटोकॉल’च्या पाहुण्यांची बरीच गर्दी होती. अर्थात मुख्य रांग एवढी मोठी होती, की आमची ही गर्दी असली तरी तुलनेनं लवकर आत प्रवेश मिळणार होता. मग त्या कॉन्स्टेबलनं आम्हाला आमचे मोबाइल, बॅगा वगैरे सगळं समोरच्या दुकानांत उपलब्ध लॉकरमध्ये ठेवायला सांगितलं. फक्त एक मोबाइल घेऊन आम्ही आत गेलो. तिथं पुन्हा एका ठिकाणी सगळ्यांची नावं नोंदवून घेत होते. मग जो एक मोबाइल होता, तोही तिथल्या पोलिस लॉकरमध्ये ठेवावा लागला. आतला परिसर भव्य आहे. अगदी समोरच ती ग्यानव्यापी मशीद दिसली. तिला काटेरी कुंपणांनी बंदिस्त केलं आहे. त्याच्या बाजूला सगळा कॉरिडॉर व मंदिर परिसर आहे. हा सगळा अलीकडच्या काळात विकसित झालेला भाग आहे आणि आधी असं नव्हतं. काशी विश्वनाथाच्या मंदिराविषयी माझा जो समज होता, तसं तिथं काही आढळलं नाही. मला वाटत होतं, आपल्याकडच्या पंढरपूर किंवा अंबाबाईच्या देवळासारखं जुनं, पाषाणांचे खांब असलेलं देऊळ असेल. मात्र, तसं काही नव्हतं. आत त्या मोकळ्या जागेच्या मध्यभागी एक अगदी छोटंसं मंदिर होतं. त्याचा कळसही जेमतेम पंधरा फूट वगैरे असेल. या जागेत भारतीयाचं सर्वांत महत्त्वाचं श्रद्धास्थान, मोक्षाचं द्वार वास करून होतं. मला त्या वातावरणात फारच भरून आलं. आतल्या संगमरवरी फरशांवरून आम्ही भराभर पुढं चालत होतो. शुभमनं आम्हाला थेट त्या मंदिराच्या आत नेलं. आम्ही आत गेल्यावर पोलिसानं ते दार लावून घेतलं. आम्ही नशीबवान ठरलो. मग अगदी थोड्या वेळात काशी विश्वनाथाच्या शिवलिंगाचं दर्शन झालं. हे शिवलिंग जरा खाली आहे. त्यामुळं सतत ‘नीचे देखो, नीचे देखो’चे घोष ऐकू येत होते. रांगेचा रेटा पुष्कळ होता, तरीही आम्हाला बरंचसं चांगलं दर्शन झालं, असं म्हणता येईल. तिथून बाहेर आल्यावर मग आम्ही त्या आवारातल्या इतर मंदिरांचं दर्शन घेतलं. शेजारी एका ओवरीसारख्या जागेत जरा वेळ बसलो, तिथं एका देवासमोर पुजारी तांदूळ देत होते. ते जवळ ठेवायचे आणि घरच्या धान्यात टाकायचे म्हणे. काशीचे प्रसिद्ध पंडे किंवा तत्सम मंडळींचा मला तरी तिथं कुठेही मागमूस दिसला नाही किंवा त्यांचा काही त्रासही झाला नाही.
आम्ही अगदी लवकरच दर्शन घेऊन बाहेर आलो. आमच्या स्थानिक मित्रांमुळं हे शक्य झालं होतं. आता त्यांनी आम्हाला जुन्या काशीतली सगळी मंदिरं दाखवायचा चंग बांधला. आम्ही आपले त्यांच्या मागोमाग ते गल्लीबोळ फिरू लागलो. असं म्हणतात, की भारतात जितकी प्रसिद्ध शिवालयं आहेत त्यांची एक ब्रँच (काशी खण्ड) वाराणसीत आहेच. पशुपतेश्वराचं मंदिर तर लगेचच दिसलं. एक राधा-रमण मंदिर होतं. तिथं आता वाड्यासारखा भाग होता. आत कुणीच नव्हतं. आम्ही जरा तिथं टेकलो. मग पुन्हा भटकंती सुरू. पिता महेश्वर, सर्व ग्रहांची नावं असलेलं एक संकुल (बुधेश्वर, शुक्रेश्वर वगैरे), पन्नास फूट खोलवर असलेला महादेव अशी अनेक मंदिरं बघत बघत आम्ही आणखी एका मंदिर संकुलात गेलो. तिथून मधल्या रस्त्यानं पुढं गेलो तर तो रस्ता एका घाटावर जात होता. दोन पायऱ्या वर चढून आलो तर समोर एकदम गंगामाई! अहाहा... काल काही हजार फूट उंचावरून पहिल्यांदा गंगेचं दर्शन झालं होतं आणि इथं आता मी तिच्यापासून काही फूट अंतरावर उभा होतो. कुठल्याशा अनामिक आकर्षणानं, ओढीनं, भक्तिभावानं भरलेल्या मनानं मी त्या घाटाच्या पायऱ्या उतरू लागलो... काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं होतं आणि आता गंगामाई बोलावत होती...

(क्रमश:)



-----

(वाराणसी व अयोध्या यात्रेचे आणखी फोटो व रील्स पाहण्यासाठी फेसबुक व इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा.)

----

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...


--------



30 Mar 2026

रूपेरी मुकुटाचे मानकरी- अडूर गोपालकृष्णन

समांतर सिनेमाचे अध्वर्यू
-----------------------------

(पुणे आकाशवाणीवर दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांच्या जीवनावर आधारित ‘रूपेरी मुकुटाचे मानकरी’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेत मी काही भाग लिहिणार आहे. त्यापैकी अडूर गोपालकृष्णन यांच्यावर लिहिलेला भाग नुकताच प्रसारित झाला. या भागासाठी लिहिलेली संहिता...)

अडूर गोपालकृष्णन म्हणजे भारतीय चित्रसृष्टीच्या नभांगणातील एक लखलखतं नक्षत्र. अत्यंत प्रतिभावंत दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते असलेले अडूर गोपालकृष्णन यांना मल्याळम चित्रपटसृष्टीत 'न्यू वेव्ह’ची सुरुवात करण्याचं श्रेय दिलं जातं. केरळी समाजाचे संवेदनशील आणि अतिशय प्रगल्भ चित्रण करणारे  त्यांचे चित्रपट पाहिले, की त्यांच्या प्रतिभेची कल्पना येते.
मौटात्तू गोपालकृष्णन उन्नितन हे त्यांचं मूळ नाव. पुढं त्यांनी त्यांच्या गावाचं नाव घेतलं. त्यांचा जन्म ३ जुलै १९४१ रोजी केरळमधील अडूरजवळ पल्लिकल इथं झाला. त्यांचं कुटुंब कलेची आवड असणारं होतं. त्यांचे वडील स्वयंवंमदत्त माधवन उन्नितन आणि आई गौरी कुंजम्मा यांच्याकडून त्यांना सांस्कृतिक वारसा मिळाला. वयाच्या आठव्या वर्षापासूनच त्यांनी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.  त्यांनी लहानपणीच अनेक नाटकांचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. त्यामुळं गोष्ट सांगण्याची कला त्यांच्या अंगी विकसित झाली. त्यांचं बालपण केरळमधील पारंपरिक 'कथकली' आणि स्थानिक कलांच्या वातावरणात गेलं. त्यांच्या अनेक चित्रपटांत दिसणारी संथ लय आणि दृश्यात्मकता यावर या बालपणीच्या संस्कारांचा मोठा प्रभाव आहे. अडूर यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण स्थानिक शाळांमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी गांधीग्राम रुरल इन्स्टिट्यूटमधून पदवी मिळवली आणि काही काळ सरकारी नोकरीही केली.  मात्र, कलेच्या ओढीमुळं ते सिनेमाकडं वळले. केरळच्या मातीतील कला आणि नाटकांची ओढ यामुळंच ते जागतिक दर्जाचे दिग्दर्शक होऊ शकले, असं म्हणावं लागेल.
पुढं चित्रपट कलेचं औपचारिक शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात आले. अडूर गोपालकृष्णन आणि ‘एफटीआयआय’ यांचं नातं अत्यंत जिव्हाळ्याचं आहे. एका अर्थानं गोपालकृष्णन यांच्या भविष्यातील झळाळत्या कारकिर्दीचा पाया आपल्या पुण्यातच रचला गेला. १९६२ मध्ये अडूर यांनी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी चित्रपट दिग्दर्शन आणि पटकथा लेखन या विषयांत विशेष प्रावीण्य मिळवलं. पुण्यात शिक्षण घेत असतानाच त्यांनी जागतिक दर्जाचे सिनेमे पाहिले. श्रेष्ठ दिग्दर्शक सत्यजित राय यांनी जेव्हा ‘एफटीआयआय’ला भेट दिली होती, तेव्हा अडूर त्यांच्या कामामुळे प्रचंड प्रभावित झाले होते. पुण्यात शिकत असतानाच त्यांना सिनेमा हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून, ते एक प्रभावी कलात्मक माध्यम असल्याचं उमजलं. त्यांनी १९६५ मध्ये आपली पदवी पूर्ण केली.
गोपालकृष्णन अतिशय तब्येतीत सिनेमे तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पाच दशकांहून दीर्घ अशा कारकिर्दीत त्यांनी केवळ १२ पूर्ण लांबीचे चित्रपट तयार केले. त्यांच्या ‘स्वयंवरम’ या १९७२ मध्ये आलेल्या पहिल्याच चित्रपटानं मल्याळी चित्रपटसृष्टीत अक्षरश: क्रांती घडवली. समांतर सिनेमाची ‘नवी लाट’ याच सिनेमापासून मल्याळी चित्रपटसृष्टीत सुरू झाली असं मानलं जातं. यानंतर ‘कोडिअट्टम’, ‘एलिप्पाथायम’, ‘मुखामुखम’, ‘अनंतराम’, ‘मथिलुकल’, ‘विधेयन’,  ‘कथापुरुषन’, ‘निजालुकुथू’, ‘नानू पेन्नुंगल’, ‘ओरू पेन्नुम रंदानम’ आणि ‘पिन्नेयुम’ हे त्यांचे आणखी ११ चित्रपट आले.

‘स्वयंवरम’विषयी बोलायचं तर १९७२ मध्ये आलेला हा चित्रपट 'विस्वम' आणि 'सीता' या प्रेमी युगुलाची कथा आहे. अभिनेता मधू व अभिनेत्री शारदा यांनी यात नायक-नायिकेच्या भूमिका केल्या आहेत. या चित्रपटातील नायक-नायिका आपल्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न करून एका नवीन शहरात, म्हणजे तिरुअनंतपुरम इथं आपलं नवं आयुष्य सुरू करण्यासाठी येतात. सुरुवातीला स्वप्नवत वाटणारं त्यांचं आयुष्य हळूहळू गरिबी, बेरोजगारी आणि आर्थिक अडचणींमुळं कठीण होत जातं. आदर्शवाद आणि कठोर वास्तव यांच्यातील हा संघर्ष अडूर गोपालकृष्णन यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. या चित्रपटाची वैशिष्ट्यं अनेक आहेत. यात अडूर यांनी बरेच तांत्रिक प्रयोग केले. हा 'सिंक साउंड’, म्हणजे' थेट चित्रीकरणाच्या वेळी ध्वनिमुद्रण करणं, या तंत्राचा आणि बाह्य लोकेशन्सचा वापर करणारा पहिला मल्याळी चित्रपट होता. यात व्यावसायिक चित्रपटांप्रमाणे गाणी, नृत्य किंवा उगाच घातलेला विनोद नव्हता. चित्रपटाची सुरुवात एका बस प्रवासाच्या पाच मिनिटांच्या दीर्घ शॉटनं होते. हे दृश्य त्या काळातील चित्रपट निर्मितीच्या पद्धतीपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. सुरुवातीला या चित्रपटाला चित्रपटगृहांत फारसा प्रतिसाद मिळाला नाही, परंतु राष्ट्रीय पुरस्कारांनंतर तो प्रचंड गाजला. १९७३ च्या विसाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटानं चार प्रमुख पुरस्कार पटकावले. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्णकमळ, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अडूर गोपालकृष्णन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री शारदा आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रण मंकडा रविवर्मा असे हे चार पुरस्कार होते. हा चित्रपट आजही त्याची कथनशैली आणि मानवी भावभावनांच्या वास्तववादी चित्रणामुळं जगभरातील सिनेप्रेमींच्या अभ्यासाचा विषय आहे.
अडूर यांचा १९८१ मध्ये आलेला ‘एलिप्पथायम’ हा चित्रपट अडूर यांच्या कारकिर्दीतील मास्टरपीस मानला जातो. या शीर्षकाचा शब्दश: अर्थ आहे उंदराचा पिंजरा. केरळमधील तत्कालीन सरंजामशाही व्यवस्थेचा अंत होत असताना, बदलत्या काळाशी जुळवून न घेऊ शकणाऱ्या एका माणसाची ही कथा आहे. या चित्रपटाला लंडन चित्रपट महोत्सवात सर्वांत कल्पक चित्रपट' म्हणून पुरस्कार मिळाला होता. यानंतर अडूर यांनी १९८४ मध्ये ‘मुखामुखम’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. हा चित्रपट राजकीय विचारसरणी आणि कम्युनिस्ट चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. एका क्रांतिकारक नेत्याचं एकाकीपण आणि त्याच्याबद्दल समाजात असणाऱ्या प्रतिमांचा संघर्ष यात पाहायला मिळतो. यापुढचा त्यांचा चित्रपट होता १९८७ मध्ये आलेला ‘अनंतराम’. हा चित्रपट मानवी मानसशास्त्र आणि कथानक मांडण्याच्या शैलीवर आधारित आहे. 'सत्य' आणि 'कल्पना' यातील पुसट रेषा यात एका तरुणाच्या दृष्टिकोनातून यात दाखविण्यात आली आहे. यानंतर अडूर यांचा महत्त्वाचा चित्रपट म्हणजे १९९० मध्ये आलेला ‘मथिलुकल’. या शीर्षकाचा अर्थ आहे भिंती. प्रसिद्ध लेखक वैकोम महंमद बशीर यांच्या आत्मचरित्रात्मक कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. यात मल्याळी सुपरस्टार मामुट्टी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. तुरुंगातील एका कैद्याचं एका अदृश्य महिला कैद्याशी जडलेलं नातं यात अतिशय हळुवारपणे दाखवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यात त्या महिला कैद्याचा फक्त आवाज ऐकू येतो.
अडूर यांचा पुढचा चित्रपट म्हणजे १९९३ मध्ये आलेला ‘विधेयन’. याचा शब्दश: अर्थ आहे चापलूस. हा चित्रपट सत्ता, अत्याचार आणि गुलामगिरी यांचे चित्रण करतो. एका क्रूर जमीनदाराचा त्याच्या नोकरावर असणारा मानसिक आणि शारीरिक प्रभाव या सिनेमात अंगावर येणाऱ्या वास्तववादाने मांडला आहे. यातही मामुट्टी यांनी साकारलेली खलनायकी भूमिका संस्मरणीय ठरली आहे.
अडूर यांनी २००२ मध्ये ‘निजालुकुथू’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. फाशी देणाऱ्या एका जल्लादाची मानसिकता आणि त्याला वाटणारी अपराधीपणाची भावना या चित्रपटात केंद्रस्थानी आहे. अडूर यांचे चित्रपट केवळ कथा सांगत नाहीत, तर ते प्रेक्षकांना त्या काळातील सामाजिक आणि मानसिक स्थितीचा विचार करायला भाग पाडतात. यामुळंच भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अडूर गोपालकृष्णन यांचं स्थान केवळ एक दिग्दर्शक एवढंच नसून ते समांतर चित्रपट चळवळीचे एक महत्त्वपूर्ण स्तंभ आहेत. जागतिक स्तरावर सत्यजित राय यांच्यानंतर भारतीय सिनेमाची ओळख ज्या मोजक्या दिग्दर्शकांमुळं टिकून आहे, त्यांत अडूर यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल.
अडूर यांच्या योगदानाचा आढावा घेताना, 'न्यू वेव्ह' सिनेमाची मुहूर्तमेढ ही त्यांची कामगिरी अगदी ठळक म्हणावी लागेल. 'स्वयंवरम'द्वारे त्यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीत एका नव्या पर्वाची सुरुवात केली, हे पुन्हा एकदा अधोरेखित करावंसं वाटतं. गाणी, मारामारी आणि अतिरंजित नाटकीपणाला फाटा देऊन, साधेपणा आणि वास्तववादाचा स्वीकार करणारा हा सिनेमा भारतीय प्रेक्षकांसाठी नवा होता. अडूर यांच्या चित्रपटांचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची 'दृकश्राव्य भाषा'. ते संवादांपेक्षा दृश्ये आणि ध्वनी यांच्या माध्यमातून कथा सांगण्यावर भर देतात. पात्रांची शांतता, निसर्गाचे आवाज आणि मानवी हालचालींतून ते चित्रपटाचा आशय समृद्ध करतात. याखेरीज त्यांचे चित्रपट केवळ वरवरची गोष्ट सांगत नाहीत, तर ते मानवी मनाचा आणि सामाजिक व्यवस्थेचा सखोल वेध घेतात. विशेषत: 'एलिप्पथायम'मध्ये त्यांनी सरंजामशाही मानसिकतेचा ऱ्हास कसा होतो, हे प्रभावीपणे दाखवलं आहे. 'विधेयन’मधून सत्ता आणि गुलामगिरीच्या मानसिकतेवर अडूर यांनी भाष्य केलं. त्यांच्या कथांमध्ये केरळचा समाज, तिथलं राजकारण आणि मानवी नातेसंबंधांचे गुंतागुंतीचे पदर उलगडतात.
याशिवाय अडूर यांचं महत्त्वाचं योगदान म्हणजे केरळमधील फिल्म सोसायटी चळवळीचे ते जनक आहेत. चित्रलेखा फिल्म सोसायटीची स्थापना करून, त्यांनी जागतिक सिनेमा सामान्य मल्याळी प्रेक्षकांपर्यंत पोचवला. चित्रपट निर्मितीसोबतच चित्रपट साक्षरता वाढवण्यात त्यांचं योगदान मोलाचे आहे. एफटीआयआयमधून प्रक्षिक्षण घेतल्यामुळं चित्रपटांच्या तांत्रिक बाबींतही ते जागरूक असतात. तांत्रिक शिस्तीबरोबरच छायाचित्रण, संपादन आणि ध्वनिमुद्रण या प्रत्येक बाबतीत ते अत्यंत चोखंदळ असतात. त्यांच्या चित्रपटातील प्रत्येक 'फ्रेम' एखाद्या चित्रासारखी रेखीव असते. थोडक्यात सांगायचं तर अडूर गोपालकृष्णन यांनी भारतीय सिनेमाला केवळ मनोरंजन न मानता 'एक गंभीर कलाप्रकार' म्हणून जागतिक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या चित्रपटांनी अनेक पिढ्यांच्या दिग्दर्शकांना प्रेरणा दिली असून, 'कलात्मक सिनेमा' कसा असावा, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे.
अडूर यांच्या चित्रपट निर्मितीची शैली अतिशय शिस्तबद्ध आणि तांत्रिकदृष्ट्या अचूक असते. त्यांच्या तंत्राची काही महत्त्वाची वैशिष्ट्यं सांगायची, तर संथ गती आणि 'दीर्घ शॉट’ हे एक ठळक वैशिष्ट्य जाणवतं. त्यांच्या चित्रपटांची गती मुद्दाम संथ ठेवली जाते. प्रेक्षकांना पात्राच्या मानसिक अवस्थेत शिरता यावं, यासाठी ते लांब शॉट वापरतात. घाईघाईनं दृश्यं बदलण्याऐवजी, ते कॅमेरा एका जागी स्थिर ठेवून त्या दृश्यातील नैसर्गिक हालचाली टिपण्यावर भर देतात. त्यांच्या सिनेमांत ध्वनीचा कल्पक वापर दिसून येतो. म्हणून त्यांच्या सिनेमात पार्श्वसंगीत  खूप कमी असतं. त्याऐवजी ते नैसर्गिक ध्वनींचा वापर करतात. उदाहरण द्यायचं तर दारं उघडण्याचा आवाज, पावलांचा आवाज किंवा पक्ष्यांचा चिवचिवाट असे आवाज टिपण्यावर ते भर देतात. 'एलिप्पथायम'मध्ये उंदराचा पिंजरा पडण्याचा आवाज किंवा पात्रांची शांतता ही संवादांपेक्षा जास्त प्रभावी ठरते, हे अनेक प्रेक्षकांनी अनुभवलं आहे. 'फ्रेमिंग' आणि रचना याबाबतही अडूर गोपालकृष्णन आपलं वेगळेपण राखून आहेत. अडूर यांचे प्रत्येक दृश्य एखाद्या चित्रासारखं असतं. ते पात्रांना खिडक्या, दारं किंवा खांबांच्या मागे अशा प्रकारे उभे करतात, की त्यातून पात्राची मानसिक कोंडी किंवा एकाकीपण स्पष्टपणे दिसतं. 'क्लोज-अप' शॉट्सचा वापर ते खूप मर्यादित आणि फक्त महत्त्वाच्या क्षणीच करतात. कमीत कमी साधनांतून जास्तीत जास्त आशय व्यक्त करण्यावर ते विश्वास ठेवतात. त्यांच्या चित्रपटात भपकेबाज सेट्स नसतात, तर केरळमधील जुनी घरं आणि निसर्गाचा नैसर्गिक वापर केला जातो. पात्रांचे संवादही मोजके आणि अर्थपूर्ण असतात. अडूर स्वतः त्यांच्या चित्रपटांच्या संकलन प्रक्रियेत पूर्णपणे गुंतलेले असतात. त्यांच्या मते, संकलन म्हणजे केवळ दृश्यं जोडणे नव्हे, तर चित्रपटाला एक लय देणं होय. कथेचा प्रवाह संथ असला तरी तो कधीही कंटाळवाणा होणार नाही, याची काळजी ते संकलनाद्वारे घेतात. त्यांच्या या तांत्रिक शिस्तीमुळंच त्यांचे चित्रपट हे केवळ 'सिनेमा' न राहता एक ‘दृश्य अनुभव’ ठरतात.
अडूर गोपालकृष्णन यांच्या चित्रपटांच्या दृश्यात्मक सौंदर्यामध्ये दिग्गज छायाचित्रकार मंकडा रविवर्मा यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. या दोघांच्या जोडीने मल्याळम सिनेमाला एक जागतिक ओळख मिळवून दिली. मंकडा रविवर्मा आणि अदूर यांचा नैसर्गिक प्रकाशावर खूप विश्वास आहे. त्यांच्या चित्रपटात कृत्रिम प्रकाशाचा वापर कमीत कमी असायचा. घरातील खिडकीतून येणारा उजेड किंवा झाडांच्या सावलीतून पडणारा प्रकाश यांचा वापर करून ते पात्रांच्या मनातील भावना पडद्यावर उतरवत असत. केरळमधील जुन्या वास्तू, हिरवागार निसर्ग आणि पावसाळी वातावरण मंकडा रविवर्मा यांनी अतिशय जिवंतपणे टिपलंय.
'स्वयंवरम' आणि 'एलिप्पथायम'मधील दृश्यं पाहताना प्रेक्षकांना आपण स्वतः त्या वातावरणात आहोत, असा भास होतो. मंकडा यांनी केवळ सुंदर दृश्यं टिपली नाहीत, तर कॅमेरा अँगलच्या माध्यमातून पात्रांचं अंतर्मन मांडलं. उदाहरण द्यायचं तर 'एलिप्पथायम' मध्ये मुख्य पात्राची हतबलता दाखवण्यासाठी ते अनेकदा पात्राला दाराच्या चौकटीत किंवा खांबांच्या अडथळ्यात चित्रित करत, त्यामुळं त्या पात्राचा कोंडमारा प्रेक्षकांना जाणवतो. अडूर यांच्याप्रमाणेच मंकडा यांची शैलीही 'मिनिमलिस्टिक' होती. अनावश्यक कॅमेरा हालचाली करण्याऐवजी ते एका स्थिर शॉटमध्ये जास्तीत जास्त अर्थ भरण्यावर भर देत. यामुळे चित्रपटात एक प्रकारची शांतता आणि गांभीर्य निर्माण होत असे. अडूर गोपालकृष्णन यांनी आपल्या कारकिर्दीतील बहुतांश महत्त्वाचे चित्रपट मंकडा रविवर्मा यांच्यासोबतच केले. या दोघांमधील सामंजस्य इतकं होतं, की अडूर यांना काय अपेक्षित आहे हे मंकडा शब्दांशिवाय ओळखून कॅमेऱ्यात कैद करत असत. मंकडा रविवर्मा यांच्या कॅमेऱ्याने अडूर यांच्या कथांना 'काव्यात्मक वास्तववाद' दिला. त्यांच्या छायाचित्रणामुळंच हे चित्रपट आजही तांत्रिकदृष्ट्या कालबाह्य वाटत नाहीत.
अडूर यांनी भारतीय सिनेमाला ‘सिनेमाची भाषा’ शिकवली. त्यांच्या प्रभावामुळं अनेक तरुण दिग्दर्शकांनी व्यावसायिक गणितं सोडून कलात्मक चित्रपट तयार करण्याचं धाडस केलं. अडूर यांची शिस्त आणि त्यांचं सौंदर्यशास्त्र यांचा प्रभाव कन्नड सिनेमांत गिरीश कासारवल्ली, मल्याळी सिनेमांत शाजी एन. करुण आणि जागतिक स्तरावरील अनेक दिग्दर्शकांवर पडलेला दिसतो. मराठीतील तरुण दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याच्याही कलाकृतींवर अडूर यांच्या शैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. आपली संस्कृती आणि मातीतील कथा प्रामाणिकपणे मांडल्या, तर त्या जागतिक स्तरावर कशा पोहोचवता येतात, याचा वस्तुपाठ अडूर यांनी नव्या पिढीला घालून दिला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. महागडे सेट्स नसतानाही केवळ उत्कृष्ट पटकथा आणि तांत्रिक अचूकतेच्या जोरावर दर्जेदार चित्रपट कसे तयार करता येतात, हे अडूर यांनी सिद्ध केलंय.
अडूर गोपालकृष्णन हे केवळ दिग्दर्शक नाहीत, तर ते एक प्रगल्भ लेखक आणि विचारवंतही आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या सर्व चित्रपटांच्या पटकथा त्यांनी स्वतः लिहिल्या आहेत. त्या केवळ संवादरूपी नसून, त्यात दृश्यांचं सविस्तर वर्णन असतं. शिवाय त्यांनी चित्रपट या विषयावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यातील 'सिनेमायुडे लोकं' (अर्थ : चित्रपटाचे जग) या पुस्तकाला १९८३ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. चित्रपटाच्या व्याकरणानुसार त्यांनी लिहिलेलं 'दी एक्सपीरियन्स ऑफ सिनेमा' हे पुस्तक चित्रपट अभ्यासाच्या विद्यार्थ्यांसाठी आजही मार्गदर्शक मानलं जातं.
अडूर यांनी सुरू केलेल्या  चित्रलेखा फिल्म सोसायटीमुळं केरळमधील सर्वसामान्य प्रेक्षकांना जागतिक सिनेमा, उदाहरणार्थ कुरोसावा, बर्गमन, गोदार्द यांचे चित्रपट, पाहण्याची संधी मिळाली. आज केरळमध्ये जो सिनेप्रेमी वर्ग आहे, त्याचं मोठं श्रेय अडूर यांच्या या उपक्रमाला जातं. थोडक्यात सांगायचं, तर अडूर गोपालकृष्णन यांनी भारतीय सिनेमाला 'मनोरंजन' या चौकटीतून बाहेर काढून, त्याला 'तात्त्विक आणि राजकीय अधिष्ठान' प्राप्त करून दिलं.
अडूर यांचं व्यक्तिमत्त्व शिस्तप्रिय आहे. चित्रपटाच्या सेटवर शांतता राखणं आणि प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्म नियोजन करणं हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या पत्नी सुनंदा यांनी त्यांच्या कलात्मक प्रवासात त्यांना मोठी साथ दिली. २०१५ मध्ये त्यांच्या निधनानंतर अडूर यांनी काही काळ चित्रपट निर्मितीपासून विश्रांती घेतली होती. इतके मोठे जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक असूनही, अडूर आजही अतिशय साधे आयुष्य जगतात. त्यांना अनावश्यक प्रसिद्धी किंवा झगमगाटात राहणे आवडत नाही. अगदी अलीकडं म्हणजे २०१६ मध्ये त्यांनी 'पिन्नेयुम' हा चित्रपट दिग्दर्शित केला. यात दिलीप आणि काव्या माधवन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट गुन्हेगारी आणि मानवी लोभावर आधारित होता. आज वयाच्या ८५ व्या वर्षीही ते स्थानिक चित्रपट महोत्सवांमध्ये सक्रिय असतात. ते आजही नवीन पिढीच्या चित्रपटांचे बारकाईने निरीक्षण करतात आणि त्यावर परखड मते मांडतात. ते एका चित्रपटासाठी खूप वेळ घेतात. त्यांच्या दोन चित्रपटांमध्ये अनेकदा ४ ते ५ वर्षांचं अंतर असतं; कारण ते पटकथेवर खूप सखोल काम करतात. त्यांच्या चित्रपटांप्रमाणंच त्यांना खऱ्या आयुष्यातही केरळच्या निसर्गाची आणि तिथल्या पारंपरिक वास्तुकलेची खूप ओढ आहे.
अडूर गोपालकृष्णन यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा ‘इमेजेस/रिफ्लेक्शन्स', अर्थात बिंब-प्रतिबिंब या शीर्षकाचा एक अप्रतिम माहितीपट प्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांनी ‘एनएफडीसी’साठी तयार केला आहे. हा माहितीपट केवळ अडूर यांच्या आयुष्याचा प्रवास नाही, तर त्यांच्या सिनेमाच्या भाषेचा शोध आहे. कासारवल्लींनी तो अतिशय संथ आणि लयबद्ध पद्धतीने मांडला आहे. या माहितीपटाची रचना पाच भागांत करण्यात आली आहे. कासारवल्लींनी अडूर यांच्या कामाची विभागणी त्यांच्या सिनेमातील प्रतिमांनुसार केली आहे. यात अडूर यांच्या चित्रपटांमधील ध्वनी, शांतता आणि प्रतिमा  यांचा वापर कसा केला जातो, यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. अडूर गोपालकृष्णन हे केवळ कथा सांगत नाहीत, तर ते माणसाच्या अस्तित्वाचा, सत्तेचा आणि मानवी स्वभावातील गुंतागुंतीचा शोध घेतात. 'स्वयंवरम'पासून ते त्यांच्या नंतरच्या चित्रपटांपर्यंतचा हा प्रवास यात उलगडतो. अडूर यांच्यावर सत्यजित राय यांच्या सिनेमाचा असलेला प्रभाव आणि त्यातून त्यांनी स्वतःची एक वेगळी, स्वतंत्र 'मल्याळम' सिनेसृष्टी कशी उभी केली, याचं चित्रण या माहितीपटात आहे. केरळची भूमी, तिथली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती त्यांच्या सिनेमात कशी अविभाज्य भाग असते, हे कासारवल्लींनी बारकाईनं टिपलं आहे. अडूर स्वतः त्यांच्या सेटवरचे अनुभव, त्यांची शिस्त आणि कॅमेऱ्यामागचा त्यांचा दृष्टिकोन यावर बोलतात. अस्पष्ट शेवट किंवा ज्याला आपण 'ओपन एंडेड' सिनेमे म्हणतो, तो अडूर यांच्या सिनेमाचा आत्मा आहे. प्रेक्षकांना सगळंच ताटात वाढून न देता, त्यांना विचार करायला लावणं आणि सिनेमा संपल्यावरही तो डोक्यात तसाच चालू राहणं, हे त्यांच्या शैलीचं वैशिष्ट्य. एक दिग्दर्शक प्रेक्षकांच्या बुद्धिमत्तेचा कसा आदर करतो, हे कासारवल्लींनी या माहितीपटात खूप प्रभावीपणे मांडलंय. या दोन्ही दिग्दर्शकांनी या माहितीपटात मारलेल्या गप्पा अनेक सिनेमाप्रेमींना पर्वणीसारख्याच वाटतील, यात शंका नाही.
अडूर गोपालकृष्णन यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी तयार केलेले माहितीपट. चित्रपटांप्रमाणेच माहितीपटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि कलेचं महत्त्वपूर्ण दस्तऐवजीकरण त्यांनी केलं आहे. अडूर यांनी प्रामुख्याने केरळच्या समृद्ध कलापरंपरांवर आधारित दर्जेदार माहितीपट तयार केले आहेत. यात कथकली, कुडियाट्टम आणि मोहिनीअट्टम यांसारख्या शास्त्रीय नृत्य आणि नाट्य प्रकारांचा सखोल अभ्यास पाहायला मिळतो. याशिवाय त्यांनी कथकली कलाकार 'गुरू चेंगन्नूर' आणि 'कलामंडलम गोपी' यांसारख्या थोर कलाकारांच्या जीवनावर आणि कलेवर आधारित माहितीपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या ५४ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३० लघुपट आणि माहितीपट तयार केले आहेत. त्यांचे माहितीपट केवळ माहिती देणारे नसून, ते कलात्मक आणि सौंदर्यानुभव देणारे असतात. त्यांनी या माध्यमाचा वापर करून पारंपरिक कलांचे बारकावे जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहेत. सन २००० मध्ये आलेला 'कलामंडलम गोपी' आणि २००२ मध्ये आलेला 'कुडियाट्टम' हे त्यांचे काही गाजलेले माहितीपट आहेत.
एवढी उत्तुंग कामगिरी करणारे अडूर गोपालकृष्णन यांना भरपूर पुरस्कार लाभले, यात आश्चर्य नाही. ते भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक पुरस्कार विजेत्यांपैकी एक आहेत. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकूण १६ वेळा मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून त्यांना स्वयंवरम, मुखामुखम, अनंतराम, मथिलुकल आणि आणि विधेयन या चित्रपटांसाठी, तर सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून स्वयंवरम, एलिप्पथायम, कथपुरुषन आणि निजालुकुथू या चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार लाभले आहेत. केंद्र सरकारतर्फे १९८४ मध्ये ‘पद्मश्री’ आणि २००६ मध्ये ‘पद्मविभूषण’ हे नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांना ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटचा पुरस्कार आणि फ्रेंच सरकारचा 'लिजन ऑफ ऑनर' हा अत्यंत मानाचा पुरस्कारही मिळाला आहे.
चित्रपटसृष्टीतील त्यांच्या या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना सन २००४ चा सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. अशा या श्रेष्ठ दिग्दर्शकाला मानाचा मुजरा…

----

हा भाग यू-ट्यूबवर ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

----

सोहराब मोदी यांच्यावरील भाग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

----

9 Mar 2026

रूपेरी मुकुटाचे मानकरी – आशा भोसले

रूपेरी मुकुटाचे मानकरी – आशा भोसले
-------------------------------------------------


(पुणे आकाशवाणीवर दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांच्या जीवनावर आधारित ‘रूपेरी मुकुटाचे मानकरी’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेत मी काही भाग लिहिणार आहे. त्यापैकी आशा भोसले यांच्यावर लिहिलेला भाग नुकताच प्रसारित झाला. या भागासाठी लिहिलेली संहिता...)


(नोंद - संहिता बरीच दीर्घ झाल्यामुळे कार्यक्रमात सर्वच गोष्टी समाविष्ट झाल्या नाहीत. खाली कार्यक्रमाची लिंक दिली आहे. मूळ अर्ध्या तासाचा कार्यक्रम वाढवून ४० मिनिटांचा करण्यात आला. तरीही या संहितेतील काही गोष्टी वगळाव्या लागल्या. त्यामुळे ही मूळ संहिता जरूर वाचावी.)

------

श्रोते हो, नमस्कार!

आशा भोसले… भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुरेल स्वप्न… आवाजाच्या दुनियेतील एक महान व्यक्तिमत्त्व… कमालीची वैविध्यपूर्ण गाणी गाणारी ज्येष्ठ गायिका…. अतिशय खडतर अशा संघर्षातून तावून-सुलाखून बावनकशी सोन्यासारखी लखलखणारी एक खंबीर स्त्री… स्वयंपाकाच्या आवडीपासून ते गायकांच्या नकला करण्यापर्यंत अनेकविध कलागुणा जोपासणाऱ्या आणि वयाच्या नव्वदीतही तरुणांना लाजवेल अशा उत्साहात वावरणाऱ्या जणू एखाद्या मोहक आजीबाई… आशाताईंचं नाव घेतलं, की त्यांच्या एवढ्या प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर सहज उभ्या राहतात. अर्थात या सर्व प्रतिमांना दशांगुळे पुरून उरणारी दैवी सुरांची त्यांची प्रतिभा आणि तिला कठोर मेहनतीची जोड देऊन घडलेली एक असामान्य गायिका ही प्रतिमा सर्वांत लखलखीतपणे कायमच समोर येते. भारतीय चित्रपट संगीत विश्वातली जणू ‘फर्स्ट फॅमिली’ म्हणावी, अशा मंगेशकर कुटुंबात जन्म, मात्र त्या आडनावाचं कोंदण फार लहान वयातच त्यागण्याचं प्राक्तन, त्यानंतर वाट्याला आलेला प्रचंड मोठा संघर्ष आणि अतोनात अडचणींना तोंड देत फक्त गाण्यावर लक्ष केंद्रित करणारी अफाट ताकदीची गायिका… आशा भोसले म्हणजे हे सर्वच….
भारतीय बोलपटांचा इतिहास अद्याप शंभर वर्षांचाही नाही. किंबहुना ‘आलमआरा’ हा पहिला भारतीय बोलपट प्रदर्शित झाला १९३२ मध्ये आणि पुढच्याच वर्षी आशाताईंचा जन्म झाला. याचाच अर्थ ९४ वर्षांच्या बोलपटांच्या इतिहासात आशाताईंची कारकीर्द जवळपास आठ दशकांची आहे. ही नुसती आकडेवारीच थक्क करून टाकणारी आहे. आशाताईंनी या आठ दशकांतील तब्बल ५० वर्षं तरी नक्कीच आपल्या खणखणीत आवाजानं दणाणून टाकली आहेत. केवळ हिंदीच नव्हे, तर जवळपास सर्व भारतीय भाषा, एवढेच नव्हे तर काही जागतिक भाषांतही त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांच्या गायकीएवढं वैविध्य अन्य कोणत्याही गायिकेला आतापर्यंत दाखविता आलेलं नाही. मोठ्या वृक्षाखाली दुसरी झाडं वाढत नाहीत, हा निसर्गनियम आहे. असं असलं तरी लता मंगेशकर या आपल्याच मोठ्या बहिणीच्या आकाशाहून विशाल अशा प्रतिभाप्रभावापासून जाणीवपूर्वक दूर राहून आशाताईंनी आपली स्वतंत्र कारकीर्द घडवली. एवढंच नव्हे, तर लताशी सतत तुलना होण्याचा अटळ धोका पत्करून गायलेल्या प्रत्येक गाण्यावर स्वत:ची नाममुद्रा ठसठशीतपणे उमटवली.
नावाप्रमाणेच आशा भोसले यांचं सगळं जीवन म्हणजे आशेचा, विजिगीषू जीवनेच्छेचा आणि मूर्तिमंत जिद्दीचा प्रवास आहे. त्यांचा जन्म आठ सप्टेंबर १९३३ रोजी सांगलीत झाला. वडील पं. दीनानाथ मंगेशकर यांची बलवंत नाटक कंपनी तेव्हा जोरात होती. त्या कंपनीतर्फे गावोगावी नाटकांचे खेळ होत. कंपनीत दोनशे माणसं कामाला होती. या सर्वांचे पालनपोषण पं. दीनानाथ करत असत. लता आणि मीना यांच्या पाठीवर आशाचा जन्म झाला. आशा जन्मापासूनच तब्येतीनं सुदृढ आणि खोडकर होती. कंपनीत सर्वांच्या चहापाण्यासाठी भलंमोठं दुधाचं भांडं असे. त्यावर येणारी सगळी साय लहानगी आशा गट्टम करत असे. मी या सायीवरच वाढले, म्हणून नव्वदीपार जगले, असं स्वत: आशाताईंनी एका मुलाखतीत मिश्कीलपणे सांगितलं आहे. लता आणि मीना यांना वडील गाणं शिकवत. आशा मात्र हुंदडत खेळत असे. असं असलं तरी तिचा कान तयार होता. वडील तिला लहापणी पठाण, हब्ब अशा टोपणनावांनी हाका मारत असत. लता लहानग्या आशाला कडेवर घेऊन तिचे भरपूर लाड करी. एकदा शाळेत शिक्षक आशाला कशावरून तरी ओरडले. झालं. लताला राग आला. ती आशाला कडेवर घेऊन तडक घरी निघून आली. यापुढं त्या शिक्षकाच्या शाळेत जाणार नाही, असा निश्चय तिनं बोलून दाखवला. या बहिणींचं औपचारिक शिक्षण तिथंच थांबलं. मात्र, जीवनाच्या शाळेत त्या जे काही शिकल्या, त्यातून अनेकांना भरपूर काही शिकायला मिळालं. अतिशय विपरीत परिस्थिती असताना, दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत असताना आपण केवळ गाण्यामुळं जिवंत राहिलो, असं आशाताई सांगतात तेव्हा त्यांच्या कठोर तपश्चर्येची थोडीशी कल्पना येते.
आशाताईंचा स्वभाव लहानपणापासूनच बंडखोर होता. वृत्ती स्वाभिमानी होती. वडील दीनानाथ मंगेशकर यांचं १९४२ मध्ये निधन झालं तेव्हा आशाताई केवळ नऊ वर्षांच्या होत्या. आई व लता या सर्व लहान भावंडांना घेऊन मुंबईत आल्या. तिथं चर्नीरोडला पं. नवरंग नागपूरकर यांच्याकडं महिना पाच रुपये फी देऊन आशाचं संगीत शिक्षण सुरू झालं. तिची परीक्षा घ्यायला शंकरराव व्यास हे तेव्हाचे नामवंत गायक आले होते. आशानं त्यांच्यासमोर परीक्षा म्हणून गाणं म्हणायला सुरुवात केली असताना, त्यांनी तिला थांबवलं आणि सांगितलं, की तुझा पहिला नंबर आला आहे. तुला इथं शिकायची गरज नाही. त्यानंतर त्यांच्याच ओळखीनं वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आशाला गाण्याची संधी मिळाली. तेव्हापासून स्टुडिओतला माइक आणि आशाताई यांचं अद्वैत झालं. या माइकला देव मानून त्यांनी हजारो गाणी गायली. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं जावं, एवढ्या प्रचंड संख्येनं गाणी गायली. माइक समोर असताना दुसरा कुठलाही विचार करायचा नाही; तहानभूक विसरून जायची, फक्त गाणं उत्तम होईल कसं एवढाच ध्यास घ्यायचा अशा तडफेनं आशाताईंनी आपली झळाळती कारकीर्द उभी केली. अर्थात त्या कधीही आपले ते संघर्षाचे दिवस विसरल्या नाहीत.
आशाताईंच्या कारकिर्दीचे सुरुवातीचे दिवस कष्टाचे होते. दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘माझं बाळ’ या १९४३ मध्ये आलेल्या चित्रपटात ‘चला चला नवबाला’ हे आशाताईंनी गायलेलं पहिलं चित्रपट गीत. तेव्हा त्या अवघ्या ९ वर्षांच्या होत्या. हिंदीत त्यांना पहिली संधी मिळाली ती ‘चुनरिया’ या चित्रपटात. हंसराज बहल यांच्या संगीत दिग्दर्शनात त्यांनी ‘सावन आजा’ हे पहिलं गीत गायलं. याच वर्षी त्यांची गाणी असलेला ‘अंधों की दुनिया’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. त्यांनी पहिलं सोलो हिंदी गाणं गायलं ते ‘रात की रानी’ या चित्रपटात. असं असलं तरी खूप मोठं यश आशाताईंना अद्याप मिळालं नव्हतं. त्यातच त्यांनी त्यांच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठ्या असलेल्या गणपतराव भोसले यांच्याबरोबर पळून जाऊन लग्न केलं आणि त्यांच्या आयुष्यानं एक फार खडतर वळण घेतलं. पुढची सात-आठ वर्षं त्यांच्यासाठी अतिशय कठीण होती. त्यांना तीन मुलं झाली. शिवाय उत्पन्न फार नव्हतं. या काळात अक्षरश: एक वेळ जेवून दिवस काढल्याचे अनुभव आशाताई सांगतात. गणपत भोसले तसे लवकरच निवर्तले. त्यानंतर आशाताई आणि उर्वरित मंगेशकर कुटुंब पुन्हा एकत्र आलं. अर्थात ते भविष्यात… पन्नासच्या दशकात आशाताईंचा संघर्ष सुरूच होता. त्या काळात शमशाद बेगम, जोहराबाई अंबालेवाली, अमीरबाई कर्नाटकी, गीता रॉय या गायिकांचा दबदबा होता. लता मंगेशकरांनीही ‘महल’पासून स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं होतं आणि पुढं हे साम्राज्य वाढतच जाणार होतं. त्यामुळं मुख्य नायिकेची गाणी याच गायिकांना मिळायची. या काळात आशाताईंनी पोटापाण्यासाठी मिळेल ते काम स्वीकारलं. कमी बजेटच्या, दुय्यम चित्रपटांसाठी त्या पार्श्वगायन करू लागल्या. ए. आर. कुरेशी, सज्जाद हुसैन, एस. मोहिंदर, सरदार मलिक, गुलाम महंमद या संगीतकारांनी त्यांना प्रामुख्यानं गायची संधी दिली. ‘संगदिल’ या सज्जाद हुसैन यांचं संगीत असलेल्या, १९५२ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात गाणं गायल्यामुळं आशाताईंचं थोडं नाव झालं. याच वर्षी ओ. पी. नय्यर यांनी त्यांना ‘छम छमा छम’ या चित्रपटासाठी फार मोठी संधी दिली. या चित्रपटाच्या एकूण ११ पैकी १० गाणी आशाताईंना गायला मिळाली. त्यानंतर ज्येष्ठ दिग्दर्शक बिमल रॉय यांनी १९५३ मध्ये त्यांच्या ‘परिणीता’ या चित्रपटासाठी आशाताईंना संधी दिली. राज कपूरने १९५४ मध्ये आलेल्या ‘बूट पॉलिश’ या त्याच्या चित्रपटातील गाणी आशाताईंकडून गाऊन घेतली. या चित्रपटातील गाणी गाजली. आशाताईंचं नाव होऊ लागलं. याच काळात संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्याशी आशाताईंचे सूर जुळले. १९५२ ते १९५७ या काळात नय्यर यांनी आशाताईंकडून भरपूर गाणी गाऊन घेतली. त्यातही ‘नया दौर’ या बी. आर. चोपडांच्या चित्रपटातील गाण्यांमुळं आशाताई अतिशय लोकप्रिय झाल्या. ‘माँग के साथ तुम्हारा‘ किंवा ‘साथी हाथ बढाना’, किंवा ‘उडे जब जब झुल्फें तेरी’ ही गाणी तर आजही तितकीच लोकप्रिय आहेत. मुख्य नायिकेची सर्वच्या सर्व गाणी आशाताईंनी पहिल्यांदा या चित्रपटासाठी गायली. ओ. पी. नय्यर यांचा आशाताईंच्या कारकिर्दीत आणि यशात फार मोठा वाटा आहे. यापुढेही जवळपास दहा वर्षं नय्यर-आशा जोडीनं अनेक लोकप्रिय गीतं दिली. आशाताईंच्या आवाजाची ताकद ओपींना कळली होती. त्यांनी या आवाजाच्या अफाट रेंजचा पुरेपूर वापर करून घेतला. ‘आईए मेहेरबाँ’ हे मधुबालावर चित्रित झालेलं गाणं असेल किंवा ’ये हे रेशमी जुल्फों का अंधेरा’सारखं गाणं घ्या, किंवा ‘आँखों से जो उतरी है दिल में’ घ्या, ‘आओ हुजूर तुम को’मधली ती प्रसिद्ध उचकी घ्या; ‘वो हसीन दर्द दे दो’सारखं गाणं घ्या; आशाताईंच्या आवाजाचा पुरेपूर कस लागलेला दिसतो. आशाताईंनीही ही गाणी अशी गायली आहेत, की त्यांच्यासारखी अन्य कुणी गाऊ शकेल असं वाटतही नाही. दुर्दैवानं कालांतरानं आशाताई व नय्यर यांचे मतभेद झाले आणि त्यांनी एकत्र काम करणं बंद केलं. ‘चैन से हम को कभी’ या आशाताईंनी गायलेल्या अप्रतिम गीताला नय्यर यांचंच संगीत होतं. अनेक रसिकांना ते या जोडीचं ‘स्वान साँग’ किंवा भैरवी आहे, असं वाटतं. याच दशकात नय्यर यांच्याबरोबरीने एस. डी. बर्मन आणि रवी या संगीतकारांनीही आशाताईंना भरपूर संधी दिली. त्यांच्याकडून अनेक लोकप्रिय गाणी या काळात या दोन्ही संगीतकारांनी गाऊन घेतली.

पुढं १९६६ मध्ये आलेल्या ‘तिसरी मंजिल’ या चित्रपटानं आशाताईंच्या जीवनात आणखी एक वळण आणलं. संगीतकार आर. डी. बर्मन उर्फ पंचमदा त्यांच्या आयुष्यात आले. पंचमदांसोबत आशाताईंचे सूर सर्वार्थानं जुळले. अनेक उत्तमोत्तम आणि अवघड गाणी पंचम यांनी आशाताईंकडून गाऊन घेतली. ‘तिसरी मंजिल’मधल्याच ‘ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे’ या गाण्यापासून ते ‘इजाजत’मधल्या ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’पर्यंत किती गाणी सांगावीत!
‘तिसरी मंजिल’मधलं ‘आ आ आजा’ हे गाणं ऐकलं तेव्हा आशाताईंना आपण हे गाऊच शकणार नाही, असं वाटलं होतं. त्यांनी पंचमदांना तसं सांगितलं. त्यावर पंचमदांनी आपण ही चाल बदलू या, असं त्यांना सांगितलं. मात्र, नंतर आशाताईंनी हे एक आव्हान म्हणून घेतलं. त्यांचा स्वभाव तसाच होता आणि आहे. एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही म्हणजे काय, या विचारानं त्यांनी या गाण्याचा आठ दिवस सराव केला. एकदा तर त्या त्यांच्या गाडीत सराव करत असताना त्यांचा ड्रायव्हर म्हणाला, ‘ताई, काय होतंय तुम्हाला? श्वास लागतोय बहुतेक… गाडी ‘जसलोक’ला घेऊ का?’ आशाताईंचा ‘आ आ आ आ आ जा’ ऐकून ड्रायव्हर घाबरला होता. आशाताईंनीच एका मुलाखतीत त्यांच्या मिश्कील शैलीत हा किस्सा सांगितला आहे. पुढं पंचम आणि आशा यांनी त्यांच्या गाण्यांत अचाट प्रयोग केले. विशेषत: हेलन यांचं नृत्य आणि आशाताईंचा आवाज व पंचमचं दणकेबाज संगीत ही त्रयी चांगलीच लोकप्रिय झाली. मग ते ‘कारवाँ’मधलं ‘मोनिका ओ माय डार्लिंग, पिया तू अब तू आजा’ असो किंवा ‘डॉन’मधलं ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’ असो. आशाताईंनी सगळी कॅब्रे गाणी जोरदार गायिली आणि ती तुफान लोकप्रिय ठरली. असं म्हणतात, की हेलन स्वत: आशाताईंच्या रेकॉर्डिंगला उपस्थित राहायच्या आणि त्या कसं गात आहेत, याचं निरीक्षण करायच्या. त्यानुसार त्या त्यांच्यी नृत्याची रचना करायच्या. त्यामुळंच ती सगळी गाणी चांगलीच हिट झाली. ‘कटी पतंग’ या चित्रपटातलं ‘मेरा नाम है शब्बो’ हे गाणं म्हणजे तर कमाल आहे. या गाण्यात आशाताई रूढ अर्थानं गायलेल्या नाहीत. त्या केवळ गुणगुणल्यासारख्या गद्य ओळीच म्हणतात. त्याला पंचमची ‘हा हा हा हा हा’ची जोड…. यातून त्या प्रासंगिक गाण्यानं कमाल परिणाम साधला आहे. पंचम-आशा जोडीचीही अशी अनेक गाणी कमालीची लोकप्रिय ठरली. ‘चुरा लिया है दिल को जो तुमने’, ‘दो लफ्जों की है दिल की कहानी’, ‘एक मैं और एक तू’, ‘दम मारो दम’ अशी किती गाणी सांगावीत!
आशाताईंच्या आयुष्यात एक सुवर्णपर्व आलं ते ‘उमराव जान’ या चित्रपटाच्या निमित्तानं… या वेळी संगीतकार होते खय्याम. ‘उमराव जान’ची आशाताईंनी गायलेली सर्वच्या सर्व गाणी लोकप्रिय ठरली आणि त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कारही याच चित्रपटानं मिळवून दिला. या गाण्यांसाठी खय्याम यांनी आशाताईंना अर्धा नोट खाली गायला सांगितलं होतं. आशाताईंना स्वत:लाही विश्वास नव्हता, की त्या हाफ नोट खाली गाऊ शकतील का, म्हणून. मात्र, अखेर त्यांनी खय्याम यांचं ऐकलं आणि पुढचा सगळा इतिहास आहे. मूळ उमराव जान हिचा आवाज त्या पट्टीतला होता हे खय्याम यांना माहिती होतं. त्यामुळंच त्यांनी आशाताईंच्या गायनात हा बदल केला. ‘दिल चीज क्या है’, ’ये क्या जगह है दोस्तों’, ‘इन आँखो की मस्ती’, ‘जुस्तजू जिस की की…’ या सर्वच गाण्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. या चित्रपटामुळं आशा भोसले यांचं स्थान ‘एक चांगली, मेहनती गायिका’ यापासून ‘एक सर्वश्रेष्ठ, अभिजात गायिका’ या स्थानावर जे गेलं ते कायमचं. स्वत: आशाताईंनाही जणू त्या नव्यानं सापडल्या. ‘उमराव जान’ आला तेव्हा आशाताईंचं वय ४८ होतं. त्यांच्या आवाजातील परिपक्वता सर्वोच्च पातळीवर पोचली होती. इथून पुढची दोन दशकं आशाताईंनी त्यांच्या आवाजाचे विपुल प्रयोग करून रसिकांना अक्षरश: वेड लावलं. ‘उमराव जान’नंतर पाचच वर्षांत आला तो गुलजार यांचा ‘इज़ाज़त’! या चित्रपटातील ‘मेरा कुछ सामान’ आणि ‘कतरा कतरा मिलती है’ या दोन गाण्यांनी आशा-पंचम यांची जादू आपल्याला परत एकदा अनुभवता आली. आदल्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘जीवा’ या तुलनेत दुर्लक्षित चित्रपटातही ‘रोज रोज आँखो तले’ हे अप्रतिम गाणं आशाताई-पंचम जोडीनं दिलं होतं. यात आशाताईंचे सहगायक होते किशोरकुमार यांचे पुत्र अमितकुमार.
नव्वदच्या दशकातही आशाताईंनी आपला प्रभाव कायम ठेवला. १९९५ मध्ये आलेल्या ‘रंगीला’त त्यांनी ए. आर. रेहमानच्या संगीत दिग्दर्शनात निम्म्याहून कमी वयाच्या ऊर्मिला मातोंडकरला आवाज दिला. ‘याई रे याई रे जोर लगा के नाचे रे’ या आशाताईंच्या गाण्यानं तरुणाईला थिरकायला लावलं. ‘कंबख्त इश्क है ये’, ’जरा सा झूम लू मैं’, ‘किताबें बहुत सी पढी होंगी तुमने’ अशा किती तरी लोकप्रिय गाण्यांनी तेव्हा रसिकांना वेड लावलं. एकविसावं शतक उजाडल्यावरही चिरतरुण आशाताई वयानं किती तरी लहान नायिकांना पडद्यावर खणखणीत आवाज देत होत्या. ‘लगान’मध्ये ‘राधा कैसे ना जले’ गाण्यात आशाताईंनी बहार उडवून दिली होती. अगदी अलीकडं आलेल्या ‘बेगम जान’ चित्रपटातही त्यांनी ‘प्रेम में तोहरे’ हे गाणं गाऊन रसिकांना सुखद धक्का दिला होता. सतत काळाबरोबर राहण्याची हातोटी, नवनव्या गोष्टी शिकण्याची हौस, उत्तम विनोदबुद्धी आणि गाण्याचा ध्यास ही आशाताईंच्या सदासतेज व्यक्तिमत्त्वाची सहज जाणवणारी वैशिष्ट्यं.
ओ. पी. नय्यर, खय्याम आणि आर. डी. बर्मन या संगीतकारांचं आशाताईंच्या कलाजीवनात अनन्यसाधारण स्थान असलं, तरी इतर संगीतकारांसोबतही त्यांनी भरपूर काम केलं आणि अनेक अजरामर गाणी दिली. मदनमोहन आणि लता यांची जोडी प्रसिद्ध असली, तरी ‘मेरा साया’मधलं ‘झुमका गिरा रे बरेली की बजार में’ हे अतिशय लोकप्रिय गाणं मदनमोहन यांनी आशाताईंकडून गाऊन घेतलं. ‘शोख नजर की बिजलियाँ’, ‘कभी तेरा दामन ना छोडेंगे हम’, ‘जमीं से हमें आसमाँ पर…’, ‘आप को प्यार छुपाने की बुरी आदत है’ ही या जोडीची आणखी काही प्रसिद्ध गाणी. हेमंतकुमार यांनी ‘भँवरा बडा नादान हाय’सारखं अप्रतिम गाणं आशाताईंकडून गाऊन घेतलं.
शंकर-जयकिशन यांनीही आशाताईंकडून उत्तमोत्तम गाणी गाऊन घेतली. ‘परदे में रहने दो परदा ना हटाओ’ हे ‘शिकार’मधलं गाणं आजही लोकप्रिय आहे. याच गाण्यानं आशाताईंना दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. ‘अंदाज’मधलं ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ हे किशोरसोबतचं, तर ‘रात के हमसफर’ हे ‘ॲन इव्हिनिंग इन पॅरिस’मधलं रफीसोबतचं गाणं हीही शंकर-जयकिशन जोडीचीच गाणी. ‘आवाज दे के हमें तुम बुलाओ’, ‘नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठी में क्या है’ ही अशीच आणखी काही लोकप्रिय गीतं या जोडीनं दिली. लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीकडंही आशाताईंनी विपुल गाणी म्हटली, ‘लोफर’मधलं ‘कोई शहरी बाबू’, ‘अनहोनी’मधलं ‘हंगामा हो गया’, ‘हमजोली’मधलं ‘ढल गया दिन’ अशी किती तरी गाणी सांगता येतील. कल्याणजी-आनंदजी यांच्याकडे आशाताईंनी ‘डॉन’मधलं ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’, ‘विधाता’मधलं ‘उडीबाबा’ अशी उडत्या चालीची अनेक गाणी गायली. संगीतकार रवी यांच्याकडेही आशाताईंनी अनेक गाणी गायली. ‘दो बदन’मधलं ‘जब चली ठंडी हवा’, ‘ये रातें ये मौसम’, ‘आगे भी जाने ना तू’, ‘तोरा मन दर्पण कहलाए’, ‘मुझे गले से लगा लो’ अशी किती तरी गाणी या जोडीच्या नावावर जमा आहेत. बप्पी लाहिरी आणि आशाताई या जोडीने तर ‘डिस्को युगा’त आपल्या झिंगाट गाण्यांनी एकच धमाल उडवून दिली होती. ‘हिंमतवाला’मधलं ‘ताकी ओ ताकी’, ‘नमक हलाल’मधलं ‘आज रपट जाए’, ‘जवाने जानेमन’, ‘रात बाकी’ अशी किती तरी गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती. अजित वर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनात ‘विजेता’ या चित्रपटासाठी आशाताईंनी सत्यशील देशपांडे यांच्यासह गायलेलं ‘मन आनंद आनंद छायो’ हे अप्रतिम गाणं आजही रसिकांच्या लक्षात आहे.
आशाताईंनी बहुतेक सर्व मोठ्या पुरुष सहगायकांबरोबर गाणी गायली. मात्र, त्यांची विशेष जोडी जमली ती किशोरकुमारसोबत. किशोरच्या अवलिया व्यक्तिमत्त्वाला तोडीस तोड अशा आशाताई होत्या. त्यामुळे त्यांची गाणीही तशीच खुलून यायची. ‘सीएटी कॅट, कॅट माने बिल्ली’ किंवा ‘हाल कैसा है जनाब का…’, ‘छोड दो आँचल जमाना क्या कहेगा’, ‘ये रातें ये मौसम’, ‘भली भली सी इक सुरत’, ‘एक मैं और एक तू’ अशी किती तरी अवखळ, नटखट गाणी त्यांनी अगदी धमाल पद्धतीनं गायली. किशोरच्या यॉडलिंगला किंवा रेकॉर्डिंगच्या वेळी चालणाऱ्या दंग्याला आशाताई पुरून उरायच्या. त्यामुळं दोघांची केमिस्ट्रीही चांगली जुळली होती.
किशोरप्रमाणेच महंमद रफी यांच्यासह आशाताईंनी अनेक अजरामर गाणी दिली. ‘दिवाना हुआ बादल’, ‘अभी ना जाओ छोडकर’, ‘इशारों इशारों में’, ‘अच्छा जी मैं हारी चलो’, ‘ढल गया दिन’, ‘बहुत शुक्रिया बडी मेहेरबानी’, ‘आजा पंछी अकेला है’, ‘ये परदा हटा दो’, ‘गुनगुना रहे है भंवरे’, ‘हम तेरा इंतजार करेंगे कयामत तक’…. किती गाणी सांगावीत! मुकेश यांच्याबरोबरही अगदी सुरुवातीच्या काळात ‘पतली कमर है तिरछी नजर है’, ‘छोड गये बालम’, ‘जाने न नजर पहचाने जिगर’ अशी चांगली गाणी आशाताईंनी दिली.
मन्ना डे यांच्यासह आशाताईंनी अनेक गाणी गायली. सध्या पुन्हा गाजत असलेलं ‘ना तो कारवाँ की तलाश है’ हे मन्नादा आणि आशाताईंचंच ओरिजनल गाणं. ‘श्री ४२०’मधलं ‘मुड मुड के ना देख’ हेही आशा-मन्नादा जोडीचं सुपरहिट गाणं. याशिवाय ‘तू छुपी है कहाँ’, ‘दुख भरे दिन बीते रे भय्या’, ‘ये हवा, ये नदी, ये किनारा’, ‘धीरे धीरे चलना’ अशी अनेक लोकप्रिय गाणी या जोडीनं दिली. महेंद्र कपूर यांच्यासह आशाताईंनी ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ‘अरे जा रे नटखट’, ‘आजा आजा रे तुझको मेरा प्यार पुकारे’, ‘धडकने लगी दिल की तारों की दुनिया’, ‘चलो बुलावा आया है’ अशी किती तरी चांगली गाणी दिली आहेत. ही सर्व गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत.
पुरुष सहगायकांप्रमाणेच काही गायिकांबरोबरही आशाताईंनी सहगायन केलंय. त्यात अर्थातच लतादीदींबरोबर गायलेलं ‘उत्सव’मधलं ‘मन क्यूं बहका रे बहका’, शमशाद बेगम यांच्याबरोबरचं ‘लेके पहला पहला प्यार’, उषा मंगेशकरांसह गायलेलं ‘काहे तरसाये’ ही चटकन आठवणारी काही गाणी. 

आशाताईंनी हिंदीबरोबरच मराठीतही विपुल गाणी गायिली. मराठी चित्रपटसंगीतातलं एक लखलखतं दालन आशाताईंच्या नावानं आहे. त्यांची विशेष जोडी जमली ती संगीतकार सुधीर फडके यांच्यासह. ‘जगाच्या पाठीवर’ या अतिशय लोकप्रिय ठरलेल्या १९६० मधल्या मराठी चित्रपटात बाबूजी, गदिमा आणि आशा या त्रयीनं कमाल केली. यातली सगळीच गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. ‘बाई मी विकत घेतला श्याम’, ‘नाचनाचुनी अति मी दमले’, ‘तुला पाहते रे तुला पाहते’ ही आशाताईंची गाणी आजही तितकीच आवडीनं ऐकली जातात. ‘सुवासिनी’ या चित्रपटासाठी बाबूजींनी आशाताईंकडून गाऊन घेतलेलं ‘दिवसांमागुनी दिवस चालले, ऋतूमागुनी ऋतू’ हे गाणं म्हणजे तर एक चमत्कारच आहे. या दीर्घ गाण्यात प्रत्येक अंतऱ्यात बाबूजींनी वेगवेगळ्या रागात चाल बांधली आहे. हे गाणं म्हणणं आव्हानात्मक होतं. मात्र, आशाताईंनी ते सहज पेललं. बाबूजींकडून गाण्यातले शब्द, त्यांचे नेमके उच्चार, शिस्त या सगळ्या गोष्टी आशाताईंनी आत्मसात केल्या. या जोडीनं अनेक अवीट गोडीची युगुलगीतं दिली. ‘धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना’ हे तर त्यातलं मेरुमणी म्हणावं असं जगदीश खेबूडकरांचं गाणं. ‘चंद्र आहे साक्षीला’ हेही असंच अप्रतिम गाणं. ‘मुंबईचा जावई’मधलं ‘का रे दुरावा का रे अबोला’ हेही बाबूजी-आशा जोडीचं असंच एक प्रचंड लोकप्रिय गाणं. जरा नंतरच्या काळात, म्हणजे १९८५ मध्ये आलेल्या ‘शापित’मधलं ‘दिस जातील दिस येतील’ हे सुरेश वाडकरांसह गायलेलं गाणंही खूप गाजलं. नंतर १९८७ मध्ये आलेल्या ‘पुढचं पाऊल’ या चित्रपटातलं ‘एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी’ गाणं म्हणजे बाबूजी-आशाताई यांच्या गाण्यांतलं आणखी एक मानाचं पान. या गाण्याचं ऑर्केस्ट्रेशनही जबरदस्त आहे. बाबूजींच्या गाण्यांत सहसा पाहायला न मिळणारा मोठा वाद्यवृंद, व्हायोलिन्सचा ताफा यात दिसतो. आशाताईंनीही या गाण्याचं सोनं केलंय.
बाबूजींप्रमाणेच भाऊ पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह आशाताईंनी मराठीत अनेक उत्तमोत्तम गाणी दिली. यात चित्रपटगीतांबरोबरच भावगीतांचा समावेश होता. ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे’ हे हृदयनाथ मंगेशकरांनी आशाताईंकडून गाऊन घेतलेले गाणे आशाताईंच्या गायनकौशल्याची कसोटी पाहणारे होते. यात फारशी वाद्ये नाहीत. चालही अवघड. पं. हृदयनाथांच्या चाली ऐकायला सोप्या, पण गायला अतिशय अवघड, असं आशाताई आणि लतादीदी नेहमी म्हणत. ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘मी मज हरपुन बसले गं’ ही सुरेश भटांची, ‘गेले द्यायचे राहुनी’, ‘समईच्या शुभ्र कळ्या’ ही आरती प्रभूंची, ‘चांदणे शिंपीत जाशी’ हे राजा बढेंचं आणि ‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती’ ही संत ज्ञानेश्वर माउलींची अशा वैविध्यपूर्ण रचना पंडितजींनी आपल्या मोठ्या बहिणीकडून गाऊन घेतल्या. चित्रपट संगीतात ‘जैत रे जैत’मधली गाणी कोण विसरू शकेल? ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ हे तर अगदी भरपूर लोकप्रिय झालेलं गाणं आशाताईंनी अत्यंत ठसक्यात म्हटलंय. याशिवाय ‘नभ उतरू आलं… चिंब थर्थर वल्लं’ हे गाणंही आशाताईंच्या अफाट गायकीचा प्रत्यय देणारं आहे. याच चित्रपटात ‘कोण्या राजानं राजानं’ हे गाणं आशाताईंनी त्यांची कन्या वर्षा हिच्यासह म्हटलं आहे. या दोघींना एकत्र ऐकण्याचा दुर्मीळ अनुभव हे गाणं आपल्याला देतं.
आशाताईंनी १९७० मध्ये आलेल्या ‘घरकुल’ या चित्रपटात सी. रामचंद्र यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे’ हे सुरेश भटांचं अफाट रोमँटिक गाणं गायलं आहे. हे गाणं आजही तितकंच टवटवीत आणि कमाल वाटतं. राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आशाताईंनी अनेक लावण्या गायल्या. अर्थात आशाताई आणि लावण्या या प्रवासाची सुरुवात १९५९ मध्ये आलेल्या ‘सांगत्ये ऐका’मधल्या वसंत पवार यांच्या संगीतातल्या ‘हाय, बुगडी माझी सांडली गं’पासून झाली होती. आशाताईंच्या त्या ‘हाय’वर अनेक जीव आजही फिदा आहेत. आनंदघन अर्थात लतादीदींनीही आशाताईंकडून ‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी’ ही लावणी गाऊन घेतली होती. राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनात आशाताईंनी ‘सुगंधी कट्टा’ या चित्रपटात गायलेली अनेक गाणी गाजली. ‘नाचू किती नाचू किती कंबर लचकली’, ‘तीळगूळ घ्या हो गोड गोड बोला’ ही गाणी आजही रसिकांना प्रिय आहेत. विश्वनाथ मोरे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आशाताई आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं ‘गंध फुलांचा गेला सांगून’ हे ‘भालू’मधलं सुंदर गाणं कोण विसरू शकेल?
आशाताईंच्या मराठीतल्या गाण्यांची रेंज खरोखरच थक्क करणारी आहे. पुलंनी संगीत दिलेल्या ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’ या गाण्यापासून ते ‘गोरी गोरी पान फुलांसारखी छान’ किंवा ‘तुझ्या गळ्या माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा’ ही गाणी ते ‘बाई मी पतंग उडवीत होते’ किंवा ‘कुठं कुठं जायाचं हनीमूनला’पर्यंत अनेक वैविध्यपूर्ण गाणी आशाताईंनी गायिली आहेत. पिढ्यांमागून पिढ्यांचे कान तृप्त केले आहेत. बाबूजींचे चिरंजीव श्रीधर फडके यांच्यासह केलेला ‘ऋतू हिरवा’ हा नव्वदच्या दशकात आलेला भावगीतांचा अल्बमही रसिकांनी डोक्यावर घेतला. यातलं ‘सांज ये गोकुळी’ हे गाणं पुढं ‘वजीर’ चित्रपटात घेण्यात आलं. याच अल्बममधलं ‘भोगले जे दु:ख त्याला’ ही भटांची गज़ल म्हणजे तर आशाताईंचं स्वगत म्हणावं असंच आहे. अगदी हीच भावना ‘हम दोनो’मधलं ’जहाँ में ऐसा कौन है जिस को गम मिला नहीं‘ हे आशाताईंचं गाणं ऐकताना मनात येते.
मराठीप्रमाणेच हिंदीतही आशाताईंच्या गैरफिल्मी गाण्यांचं प्रमाण आणि त्याची लोकप्रियता थक्क करणारी आहे. गुलाम अलींसोबत त्यांनी केलेला ‘मिराज-ए-गज़ल’ हा अल्बम खूप गाजला. यातलं ‘सलोना सा सजन है और मैं हूँ’ हे गाणं आजही अतिशय लोकप्रिय आहे. आशाताईंना खूप लहानपणापासून चांगल्या नकला करता यायच्या. त्यांना अगदी लहान वयात काही पाश्चात्त्य गायक आणि गायिकांची गाणी ऐकायला मिळाली. आशाताईंनी तो ढंग आपल्या गायकीत आणला. पुढं आर. डी. बर्मन यांनी तर त्यांच्या या गुणाचा खूपच उपयोग करून घेतला आणि अतिशय वेगळ्या चालीची, ढंगाची गाणी दिली. ‘अलिबाबा और चालिस चोर’मधलं ‘खतूबा खतूबा’ हे आशाताईंनी अरबी ढंगात गायलेलं गाणं याचं एक उदाहरण म्हणून सांगता येईल.
आशाताई आज ९२ वर्षांच्या आहेत. आयुष्य भरभरून जगल्या आहेत. अगदी अलीकडं ‘माई’ या चित्रपटात त्यांनी अल्झायमर असलेल्या वयस्कर स्त्रीची भूमिका केली होती. पाश्चात्त्य गायकांसोबत गाण्यांचे वेगवेगळे प्रयोग त्या करत असतात. क्रिकेटपटू ब्रेट लीबरोबर २००६ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आदी त्यांनी ‘यू आर द वन फॉर मी’ हे गाणंही गायलं होतं.
खरं तर त्यांच्या कारकिर्दीतल्या सर्व गाण्यांचा वा त्यांच्या आयुष्यातल्या सर्व घटनांचा आढावा या कार्यक्रमात घेणं अशक्यच आहे. आशाताईंना अनेक पुरस्कार मिळाले. दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मविभूषण’ही त्यांना मिळालेला आहे आणि अर्थातच चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अजोड योगदानाबद्दल त्यांना २००१ मध्ये सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. एका मुलाखतीत आशाताई म्हणाल्या होत्या, ‘मीही तुमच्यासारखीच एक सर्वसामान्य स्त्री आहे. मीही भाजी आणायला जाते, मुलांचा डबा करते. स्वयंपाक करायला मला फार आवडतं. सणवार करायला आवडतात. खरेदी करायला आवडते, साड्या विकत घ्यायला आवडतात. फक्त हा जो गळा आहे तिथं देवानं जे काही ठेवलं आहे, तेवढाच आपल्यात फरक आहे. बाकी मला तुमच्यातलीच समजा…’
आशा भोसले हे काय रसायन आहे हे यावरून कळतं. व्यक्ती म्हणून तर त्या श्रेष्ठ आहेतच; पण त्यांच्या अद्भुत, अलौकिक सूरांचं गारूड या सर्वांपलीकडं आहे. आशाताई, तुमच्या संपूर्ण जीवनाकडं पाहूनच बरंच काही शिकण्यासारखं आहे. तुमच्या अलौकिक आवाजाला, जिद्दीला, मेहनतीला, विनोदबुद्धीला आणि झुंजार वृत्तीला आमचा मानाचा मुजरा!

----

हा कार्यक्रम ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

----

रूपेरी पडद्याचे मानकरी - लता मंगेशकर हा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-----