24 Aug 2026

रुपेरी मुकुटाचे मानकरी – रजनीकांत

झगमगता सुपरस्टार, साधा माणूस
-----------------------------------------


(पुणे आकाशवाणीवर दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांच्या जीवनावर आधारित ‘रूपेरी मुकुटाचे मानकरी’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेत मी काही भाग लिहिणार आहे. त्यापैकी अडूर गोपालकृष्णन यांच्यावर लिहिलेला भाग नुकताच प्रसारित झाला. या भागासाठी लिहिलेली संहिता...)

श्रोते हो, नमस्कार!
भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज, महान कलाकार होऊन गेले. अनेक कलाकारांची रुपेरी कारकीर्द थक्क करणारी, अविस्मरणीय अशी आहे. मात्र, फारच थोड्या कलावंतांना त्यांच्या हयातीतच ‘दंतकथा’ होण्याचं भाग्य लाभलं आहे. सुपरस्टार रजनीकांत हे असंच एक नाव. केवळ तमिळच नव्हे, तर भारतीय चित्रपटसृष्टीतील मोजक्या महानायकांमध्ये त्यांच्या नावाचा सहज समावेश करता येईल. तमिळमध्ये ‘थलैवा’ (अर्थ नेता किंवा बॉस) या विशेषणाने ओळखले जाणारे रजनीकांत यांची रुपेरी कारकीर्दही त्यांच्या पडद्यावरील प्रतिमेप्रमाणेच भव्यदिव्य, विस्मयचकित करणारी आहे. विशेष म्हणजे पडद्यावर अतिशय ग्लॅमरस, सुपरहिरो असणारे रजनीकांत प्रत्यक्ष आयुष्यात अतिशय साधे आहेत. कुठल्याही मेकअपविना ते साधेपणाने सर्वत्र वावरत असतात. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांच्याविषयी आणखीनच आपुलकी वाटते.
रजनीकांत यांच्या चित्रपट प्रवासाची सफर विलक्षण आहे. एका सामान्य बस कंडक्टरपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज जगातील एका अद्वितीय 'सुपरस्टार'च्या रूपाने लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचला आहे. ज्यांच्या केवळ एका नजरेने, गॉगल फिरवण्याच्या एका शैलीने आणि पडद्यावरच्या 'लार्जर दॅन लाईफ' व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर चित्रपटगृहात टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा कडकडाट होतो असा हा सुपरस्टार अभिनेता आहे.

श्रोतेहो, पडद्यावर दिसणारं ग्लॅमर, नयनरम्य रोषणाई आणि लाखो चाहत्यांचं प्रेम यांच्या मागं अनेकदा एका अत्यंत खडतर संघर्षाची कहाणी लपलेली असते. रजनीकांत यांचा प्रवासही असाच संघर्षाने आणि जिद्दीने भरलेला आहे. १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळुरूमधील एका मध्यमवर्गीय मराठी भाषक कुटुंबात एका बालकाचा जन्म झाला. नाव ठेवण्यात आलं शिवाजी. होय, रजनीकांत यांचं मूळ नाव शिवाजीराव रामोजीराव गायकवाड! आईचं नाव जिजाबाई आणि वडील रामोजीराव. या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताचीच होती. शिवाजी अवघा पाच वर्षांचा असतानाच त्याच्या आईचं छत्र हरपलं.
वयाच्या अतिशय कोवळ्या टप्प्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, घरातल्या परिस्थितीला हातभार लावण्यासाठी लहानग्या शिवाजीनं अनेक प्रकारची कामं केली. हमालीकाम करण्यापासून ते सुतारकामापर्यंत अनेक छोटी-मोठी कामं त्यानं केली. मोठा झाल्यावर शिवाजीरावांना बंगळुरू ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये बस कंडक्टरची नोकरी मिळाली.
बंगळुरूत १०४ नंबरच्या बसमध्ये तिकीट फाडणारा हा तरुण कंडक्टर... पण तो केवळ तिकीट फाडत नव्हता! तिकीट देण्याची त्याची वेगळीच शैली, सुट्टे पैसे देण्याची ढब आणि प्रवाशांशी संवाद साधण्याचं कसब यामुळे त्या बसमधील प्रवासी शिवाजीरावांच्या प्रेमात पडायचे. मित्रांनो, अंगात अभिनयाची आणि कलेची ठिणगी अशी आधीपासूनच पेटलेली होती. बस कंडक्टर म्हणून काम करतानाच ते कन्नड नाटकांमध्ये अभिनय करू लागले. 'दुर्योधन'सारख्या पौराणिक भूमिका त्यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारल्या.
अंगातील कलागुणांना अधिक धार यावी म्हणून शिवाजीरावांनी तत्कालीन मद्रास शहरात जाऊन मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचा डिप्लोमा करण्याचा निर्णय घेतला. कंडक्टरची नोकरी सोडून अनोळखी शहरात, अनोळखी भाषेत नशीब आजमावणं ही सोपी गोष्ट नव्हती. पण त्यांचा मित्र राजबहादूर याने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आणि आर्थिक मदतही केली.
फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असतानाच, तमिळ चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक के. बालचंदर यांची नजर या मराठी तरुणावर पडली. शिवाजीराव यांच्या डोळ्यांतील ती विशिष्ट चमक, शरीराची चपळाई आणि संवादफेकीची वेगळी शैली बालचंदर यांनी टिपली. बालचंदर यांनी या तरुणाला तमिळ शिकण्याचा सल्ला दिला आणि १९७५ मध्ये आलेल्या 'अपूर्व रागांगल' या चित्रपटातून त्यांना पहिली संधी दिली. याच चित्रपटादरम्यान के. बालचंदर यांनी 'शिवाजीराव गायकवाड' हे नाव बदलून त्यांना एक नवं नाव दिलं - रजनीकांत! 'अपूर्व रागांगल' चित्रपटात रजनीकांत यांची भूमिका अवघ्या काही मिनिटांची होती. चित्रपटाच्या शेवटी एका दरवाजाची कडी उघडून आत येणारा तो तरुण... प्रेक्षकांना तेव्हा कल्पनाही नव्हती, की दरवाजाची कडी उघडून आत आलेला हा नवा चेहरा पुढे जाऊन भारतीय सिनेसृष्टीचे सर्व दरवाजे स्वतःच्या हिमतीवर उघडणार आहे!
श्रोतेहो, सुरुवातीच्या काळात रजनीकांत यांना मुख्य नायकापेक्षा खलनायकाच्या आणि ग्रे-शेड्स असलेल्या भूमिका मिळाल्या. 'मुन्द्रू मुदिचू', '१६, वायाथिनिले', 'अवरगल' यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी साकारलेला नकारात्मक चेहरा प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. सिगारेट हवेत उडवून ओठांत धरण्याची त्यांची खास स्टाइल, चष्मा फिरवून डोळ्यांवर चढवणं आणि त्यांची जलद हालचाल प्रेक्षकांना प्रचंड भावू लागली.
पण के. बालचंदर आणि इतर दिग्दर्शकांच्या लवकरच लक्षात आलं, की हा अभिनेता केवळ खलनायक राहण्यासाठी जन्माला आलेला नाही. प्रेक्षक त्यांच्या स्टाइलवर आणि पडद्यावरील वावरावर फिदा होत होते.
'भैरवी' हा १९७८ मध्ये आलेला चित्रपट रजनीकांत यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला. या चित्रपटात ते पहिल्यांदा मुख्य नायकाच्या भूमिकेत दिसले. आणि याच चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान 'भैरवी'चे वितरक कलाईपुली एस. थानू यांनी मद्रासच्या रस्त्यांवर रजनीकांत यांचे ३५ फुटी कटआउट लावून त्यांना पदवी दिली - 'सुपरस्टार'!
तिथून पुढे 'मुथू', 'बाशा', 'अन्नामलाई', 'यजमान', 'पदयाप्पा' अशा एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांची मालिकाच सुरू झाली. 'बाशा' या चित्रपटाने तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीत इतिहास घडवला. एका साध्या रिक्षाचालकापासून ते अंडरवर्ल्डच्या डॉनपर्यंतचा रजनीकांत यांचा तो अभिनय प्रेक्षकांच्या कायमचा स्मरणात राहिला.

तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषांवर हुकूमत गाजवल्यानंतर रजनीकांत यांनी हिंदी सिनेसृष्टीतही आपलं नाणं खणखणीत वाजवलं. १९८३ मध्ये आलेल्या 'अंधा कानून' या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. अमिताभ बच्चन, हेमामालिनी यांच्यासारख्या दिग्गजांच्या उपस्थितीतही रजनीकांत यांनी स्वतःची वेगळी छाप पाडली.
त्यानंतर 'गिरफ्तार', 'हम', 'चालबाज', 'इन्स्पेक्टर धनुष', 'फूल बने अंगारे' यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांतून त्यांनी चांगलं यश मिळवलं. 'हम' चित्रपटातील अमिताभ बच्चन, गोविंदा आणि रजनीकांत या तिघांची जुगलबंदी आजही प्रेक्षकांना पाहायला आवडते.
पण रजनीकांत केवळ ॲक्शन आणि स्टाइलपुरते मर्यादित नव्हते. त्यपलीकडे जाऊन रजनीकांत साकारलेल्या त्यांच्या काही भूमिका भारतीय सिनेमाच्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत. 'मुथू'मधील त्यांचा सहजाभिनय, 'तलपती'मधील मणिरत्नम यांच्या दिग्दर्शनाखाली दाखवलेला भावूक आणि सशक्त अभिनय किंवा 'चंद्रमुखी'मधील सायकॉलॉजिकल थ्रिलर ड्रामा... रजनीकांत यांनी सिद्ध केलं, की ते केवळ एक स्टाइल आयकॉन नाहीत, तर एक परिपक्व आणि ताकदीचे अभिनेते आहेत. 'तलपती' या १९९१ मध्ये आलेल्या चित्रपटात रजनीकांत यांनी ‘सूर्या’ हे पात्र साकारले होते. प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या या चित्रपटात महाभारतातील कर्ण आणि दुर्योधन यांच्या मैत्रीचा आधुनिक पट मांडला होता. रजनीकांत यांनी साकारलेला अनाथ आणि स्वाभिमानी 'सूर्या' प्रेक्षकांच्या थेट काळजाला भिडला. मामुट्टींसोबतची त्यांची जुगलबंदी अद्भुत होती.
'बाशा' या १९९५ मध्ये आलेल्या चित्रपटात त्यांनी माणिक्यम या पात्राची भूमिका केली. एका साध्या, शांत रिक्षाचालकाचे जेव्हा भूतकाळातील भयानक डॉन 'माणिक बाशा'मध्ये रूपांतर होते, तो क्षण पडद्यावर पाहून प्रेक्षक थक्क झाले होते. कमर्शियल सिनेमाचा तो एक मानदंड मानला जातो.
रजनीकांत यांची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित राहिली नाही. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेला 'मुथू' हा चित्रपट जेव्हा जपानमध्ये 'मुथू: ओदोरू महाराजा' या नावाने प्रदर्शित झाला, तेव्हा जपानी प्रेक्षकांनी रजनीकांत यांना डोक्यावर घेतले! जपानमध्ये रजनीकांत यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. एका भारतीय अभिनेत्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर, विशेषतः आशियाई देशांत एवढी लोकप्रियता मिळणे ही एक दुर्मीळ गोष्ट होती.
'चंद्रमुखी' या २००५ मधील चित्रपटातील डॉ. सर्वणन आणि वेत्तय्यान राजा या त्यांच्या भूमिकाही गाजल्या. या सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटात त्यांनी एका मानसोपचार तज्ज्ञासोबतच क्रूर राजा 'वेत्तय्यान' अशी दुहेरी भूमिका साकारून आपल्या अभिनयाची अफाट ताकद दाखवून दिली.
काळासोबत रजनीकांत यांनी स्वतःला बदलले. नव्या पिढीच्या दिग्दर्शकांसोबत काम करत त्यांनी 'शिवाजी : द बॉस', 'रोबोट' (एंधिरन), 'कबाली', 'कााला' आणि 'जेलर' यांसारखे चित्रपट दिले.
एस. शंकर दिग्दर्शित 'रोबोट' चित्रपटात त्यांनी 'डॉ. वशीकरण' हा शास्त्रज्ञ आणि 'चिट्टी ' हा रोबोट अशा दोन्ही भूमिका ज्या ताकदीने साकारल्या, त्याने भारतीय व्हिज्युअल इफेक्ट्स चित्रपटांना एक नवी दिशा दिली. ‘रोबोट’ चित्रपट तुफान गाजला. पुढं त्याचा सीक्वेलही आला. मात्र, पहिला भाग अतिशय  उत्कृष्ट जमून आलेला होता. ऐश्वर्या राय या चित्रपटात त्यांची नायिका होती. वयाच्या सत्तरीतही जेव्हा रजनीकांत पडद्यावर चालत येतात, तेव्हा ‘कबाली' किंवा 'जेलर'मधील त्यांची एंट्री पाहून चित्रपटगृहाचे छत हादरून जाते! म्हणूनच त्यांना श्रद्धेने आणि प्रेमाने नाव मिळाले - 'थलैवा', म्हणजेच 'नेता' किंवा 'नायक'!
चित्रपटातील अलौकिक यश, अफाट संपत्ती आणि जगभरातील कोट्यवधी चाहत्यांचे प्रेम मिळूनही रजनीकांत नावाचा हा माणूस जमिनीवरच राहिला. पडद्यावर अतिशय भपकेबाज, रंगीबेरंगी आणि स्टायलिश दिसणारे रजनीकांत वैयक्तिक आयुष्यात अत्यंत साधे, धोती-कुर्ता परिधान करणारे, पांढऱ्या दाढी-केसांसह आणि कोणत्याही मेकअपशिवाय लोकांसमोर येणारे अतिशय ऋजू व्यक्तिमत्त्व आहे.
असं म्हटलं जातं, की जगात दोनच प्रकारचे अभिनेते असतात - एक ज्यांना चित्रपट प्रसिद्ध करतो, आणि दुसरे म्हणजे रजनीकांत, जे स्वतः एका संपूर्ण चित्रपटापेक्षा मोठे असतात! रजनीकांत यांच्या लोकप्रियतेचे किस्से आणि दंतकथा इतक्या अद्भुत आहेत, की जगातील कोणत्याही अभिनेत्याच्या वाट्याला अशी लोकमान्यता आलेली नाही. इंटरनेटच्या जगात 'रजनीकांत यांचे विनोद' किंवा 'रजनीकांत फॅक्ट्स' हा एक स्वतंत्र प्रकारच झाला. ‘रजनीकांत यांना घड्याळाची गरज नसते, वेळ ठरवते की रजनीकांत कधी काय करतील!’ किंवा ‘सूर्य उगवत नाही, रजनीकांत डोळे उघडतात!’ अशा हलक्या-फुलक्या चटकदार विनोदांमधून प्रेक्षकांनी त्यांच्या अचाट क्षमतेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.
पण या केवळ दंतकथा नव्हत्या! जेव्हा त्यांचा एखादा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होतो, तेव्हा दक्षिण भारतात अक्षरशः सण साजरा केला जातो. भल्या पहाटे तीन किंवा चार वाजताचे शो हाऊसफुल्ल होतात, त्यांच्या ५०-५० फुटी कटआउट्सना दुधाचा अभिषेक घातला जातो आणि रस्तेच्या रस्ते फटाक्यांच्या आवाजाने दणाणून जातात. अनेक कंपन्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना अधिकृत सुट्टी जाहीर करतात! ही नुसती लोकप्रियता नसून, हे प्रेक्षकांनी रजनीकांत यांचं एक प्रकारे केलेलं 'दैवतीकरण’च आहे.
श्रोते हो, रजनीकांत आणि महाराष्ट्र यांच्या नात्याविषयी सांगायलाच हवं. संपूर्ण जगानं जरी त्यांना 'तमिळ सिनेसृष्टीचे सुपरस्टार' म्हणून डोक्यावर घेतलं असलं, तरी रजनीकांत यांचा मूळ पाया आणि संस्कार मराठी मातीतलेच आहेत! छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून ज्यांचं नाव 'शिवाजीराव' ठेवलं गेलं, तो हा मराठी मुलगा. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे आराध्य दैवत. ते जरी जन्माने बंगळुरूचे असले आणि त्यांची कर्मभूमी चेन्नई असली, तरी आजही रजनीकांत आपल्या कुटुंबात अतिशय स्पष्ट आणि अस्खलित मराठी बोलतात. कोल्हापूर, पुणे आणि मुंबईशी त्यांचा जुना स्नेह आहे. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी आपल्या महाराष्ट्रातील आठवणींना उजाळा दिला आहे. एका मूळ मराठी माणसाने दाक्षिणात्य तमिळ सिनेसृष्टीवर गेल्या ५० वर्षांपासून अखंड एकछत्री साम्राज्य गाजवावं, ही प्रत्येक मराठी मनासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.
तमिळनाडूतील राजकारणात अभिनेत्यांनी राजकारणात येऊन थेट मुख्यमंत्रिपद मिळविण्याची परंपरा आहे. एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी, जयललिता ते आताचे सी. जोसेफ विजय यांच्यापर्यंत ही परंपरा सुरूच आहे. रजनीकांत यांची अफाट लोकप्रियता पाहता, तेही या वाटेने जातील, असं वाटत होतं. मात्र, रजनीकांत यांना राजकारणाची वाट जमली नाही. त्यांनी नंतर त्यापासून दूर राहणंच पसंत केलं. अर्थात त्यांच्या लोकप्रियतेवर याचा अजिबात परिणाम झालेला नाही.
त्यांच्या या प्रदीर्घ, यशस्वी आणि समर्पित चित्रपट प्रवासाचा गौरव करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना २००० मध्ये 'पद्मभूषण' आणि २०१६ मध्ये 'पद्मविभूषण' या नागरी सन्मानानं सन्मानित केलं.  २०१९ मध्ये ५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा झाली, तेव्हा संपूर्ण सिनेसृष्टीने आणि देशाने उभे राहून या महानायकाला सलाम केला. पुरस्कार स्वीकारताना रजनीकांत यांनी अत्यंत नम्रपणे आपले हे यश आपले जुने मित्र राजबहादूर, आपले गुरू के. बालचंदर आणि आपले बंधू सत्यनारायणराव गायकवाड यांना समर्पित केलं. एका कंडक्टरपासून सुरू झालेला हा प्रवास फाळके पुरस्काराच्या सुवर्णकमळापर्यंत पोहोचला, हा भारतीय चित्रपट इतिहासातील एक अतिशय प्रेरणादायी अध्याय आहे.
श्रोतेहो, तमिळ चाहत्यांसाठी तर रजनीकांत हे केवळ एक नाव नसून तो एक विचार आहे, एक फिनिक्स पक्ष्यासारखी घेतलेली झेप आहे. 'काहीही अशक्य नाही' हे आपल्या कर्तृत्वाने दाखवून देणारा हा 'रुपेरी मुकुटाचा मानकरी' आजच्या नव्या पिढीसाठीही एक मोठा आदर्श आहे.
अशा या महान कलावंताच्या अभिनय प्रवासाला आणि कलासाधनेला मानाचा मुजरा!

---
हा भाग यूट्यूबवर ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

सोहराब मोदी यांच्यावरील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----

15 Jul 2026

मटा मैफल लेख

 तिसऱ्या लग्नाची एक गोष्ट
-------------------------------


प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचं तिसरं लग्न नुकतंच पार पडलं. सेलेब्रिटी व्यक्तीच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट ही बातमी असते, असं पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात फार पूर्वीपासून शिकवलं जातं. त्यामुळं आमिरच्या या लग्नाच्या बातम्या होणारच होत्या. तशा त्या झाल्या. मात्र, आता अलीकडं केवळ बातम्या किंवा गॉसिप-गप्पांपुरतं हे मर्यादित राहिलेलं नाही. मीम्स तयार होणं हेही समजू शकतो. तरीही तारतम्य नावाच्या महत्त्वाच्या बाबीला हल्ली अनेकांनी सुट्टी दिलेली असल्यामुळं कुठली गोष्ट किती ताणायची याला काही धरबंधच राहिलेला नाही. कुठल्याही सेलेब्रिटीचं लग्न, त्यातही तिसरं लग्न याबाबत सर्वसामान्यांना निश्चितच उत्सुकता असू शकते. हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एलिझाबेथ टेलरच्या सात की आठ लग्नांच्या चर्चा आजही रंगतातच की! आमिरच्या बाबतीत त्याच्या पहिल्या दोन्ही पत्नी ‘हिंदू’ आणि तिसरी ख्रिश्चन (थोडक्यात इस्लामेतर) असल्याचा एक कोन जोडला गेल्यानं या उत्सुकतेला वेगळाच धार्मिक रंगही आला. वास्तविक बॉलिवूडमध्ये आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्न ही काही नवी गोष्ट नाही. अनेक लग्नं झाली, तर अनेक मोडलीही. न झालेल्या लग्नांमध्ये देवआनंद-सुरय्या यांचं उदाहरण सर्वांसमोर आहे. राज कपूर-नर्गिस यांच्या न झालेल्या लग्नाइतकी चर्चा तर अन्य कशाचीही झाली नसेल. यशस्वी आंतरधर्मीय लग्नांत सुनील दत्त-नर्गीस आणि मन्सूर अली खान पतौडी-शर्मिला टागोर ही दोन उदाहरणं ठळक सांगता येतील.
स्पष्ट सांगायचं, तर आंतरधर्मीय लग्नांपेक्षा दोन किंवा अधिक लग्नं करणाऱ्या नटांविषयी अधिक चर्चा होते. यात मध्यमवर्गीयांना वाटणाऱ्या सूक्ष्म असूयेचाही भाग आहेच. ‘आपल्याला एकच लग्न करण्याची मुभा किंवा ते टिकवण्याची सक्ती; आणि यांचं पाहा, दोन-दोन, तीन-तीन लग्नं करताहेत,’ असा एक मत्सरयुक्त भाव त्यात असतो. पुरुषांच्या मनात तर हे विचार शंभर टक्के येतातच. आता खरा मुद्दा इथं येतो, की खरोखर हे दुसरं किंवा तिसरं लग्न म्हणजे संबंधित पुरुषासाठी किंवा स्त्रीसाठी ‘मज्जा’ असते का? साधारण तर्कबुद्धी असलेला कोणताही माणूस हे मान्य करणार नाही. लग्न हा विषय आपल्याकडं किती तरी भावभावनांचे गुंते घेऊन येतो. ती आयुष्यभराची बांधिलकी असते असं आपण मानतो. मात्र, या पारंपरिक समजुतींपलीकडं या नात्याचा विचार करणारे अनेक जण आताच्या काळात दिसतील. दोन व्यक्तींचं एकमेकांशी पटत नसेल तर परस्पर समजुतीने वेगळं व्हायचं, हा विचार बळावत चालला आहे. लग्न म्हणजे केवळ एक नव्हे, तर साता जन्मांची गाठ अशी घट्ट समजूत असलेल्या आपल्या समाजात बहुतांश मंडळींना हा विचार अगदी आजच्या काळातही पचनी पडणं जड जातं. त्यामुळं या मनाच्या तळाशी कुठं तरी असलेला हा विरोध आमिरच्या तिसऱ्या लग्नाच्या निमित्ताने उफाळून येतो, तो वेगवेगळ्या स्वरूपात व्यक्त होऊ लागतो. टिंगलटवाळी करणं हा सर्वांत सोपा उपाय. त्यामुळं अशा लग्नाची मीम्स येतात किंवा लोक सर्रास त्याची चेष्टामस्करी करू लागतात.
नट-नट्यांच्या आयुष्यांबद्दल आपल्याला असलेली नको तेवढी उत्सुकता आणि त्यांच्या आयुष्याविषयी वेगवेगळ्या माध्यमांतून पसरवलेले गेलेले समज-गैरसमज (जास्त करून गैरसमजच) यांचाही वाटा यात मोठा आहे. सिनेमा किंवा नाटकात असलेल्या मंडळींच्या चारित्र्याविषयी आपले अजबगजब समज असतात. पडद्यावर अभिनय करत असताना का होईना, पण वेगवेगळ्या स्त्रियांशी नटाला (आणि वेगवेगळ्या पुरुषांशी नटीला) शारीर जवळीक साधायला मिळते, हे सामान्य प्रेक्षकाला दिसत असतं. आता वास्तविक ज्याने आयुष्यात एकदा तरी शूटिंग पाहिलं आहे त्याला यात किती तथ्य असतं किंवा त्या कथित जवळिकीला संबंधित नट-नटी कसे सामोरे जातात, हे नीटच समजेल. एवढं करूनही खरोखर शारीर जवळीक साधण्याची मुभा या मंडळींना असते, हे मान्य केलं तरी कालांतराने त्यात किती यंत्रवतपणा येत जातो आणि अनेकदा केवळ पाश्चात्त्य शैलीचं अनुकरण म्हणून हलकीशी मिठी मारली जाते किंंवा गालाला गाल लावले जातात हेही आता अनेकांना ठाऊक आहे. मात्र, आपल्या देशाच्या विपुल लोकसंख्येच्या मानाने सिनेमा-नाटकांचं जग फार छोटं. त्यामुळं या क्षेत्रातील लोक अनेक बाबतींत प्रिव्हिलेज्ड आहेत, अशी सर्वसामान्यांची भावना असते आणि ती काही प्रमाणात खरी आहे. याउलट आपल्याकडं लैंगिक उपासमार होत असलेला सर्वसामान्य वर्ग खूपच मोठा. अशी ही दोन परस्परविरोधी विश्वं एकमेकांसमोर येतात, तेव्हा उपेक्षित वर्गाला ‘प्रिव्हिलेज्ड’ वर्गाविषयी समजांपेक्षा गैरसमज अधिक असणार, हे समजण्यासारखं आहे.
एक गोष्ट मात्र समजून घेता येणार नाही आणि ती समाज म्हणून आपण मान्यही करू नये, ती म्हणजे या चेष्टामस्करीत त्या विवाहबंधनात अडकत असलेल्या स्त्रीची निंदा. आपल्या समाजाची घडणच अशी पुरुषप्रधान आहे, की तिसरं लग्न करणाऱ्या पुरुषापेक्षा त्याच्याशी ते लग्न करणाऱ्या महिलेला अधिक ट्रोल केलं जातं. इतकंच काय, त्याच्या आधीच्या पत्नींनाही ट्रोलधाडीला सामोरं जावं लागतं. त्या याच्या लग्नात काय करताहेत, अशा मिठ्या का मारताहेत, त्यांना एवढा कसला आनंद झालाय अशा एक ना दोन हजार शंका शंकासुरांच्या मनात फेर धरून नाचू लागतात. वास्तविक, एखाद्या लग्नातून बाहेर पडताना त्या स्त्रीला (आणि पुरुषालाही) किती आणि काय त्रास झाला असेल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. मात्र, त्यांनी सदोदित दु:खी चेहरा करून जगावं, ही लोकांची अपेक्षा समजण्यापलीकडं आहे. हल्ली ‘मूव्ह ऑन’ होण्याकडं बहुतेकांचा कल असतो आणि तो योग्यच आहे. लग्नासारख्या नातेसंबंधांबाबत ही मंडळी पारंपरिक विचारांपेक्षा वेगळा आणि प्रागतिक विचार करतात, एवढाच त्याचा अर्थ आहे.
हल्लीची पिढी लग्न आणि घटस्फोटांबाबत काय विचार करते, हे जाणून घेण्यासाठी पुण्यातील कुटुंब न्यायालयात अनेक वर्षं प्रॅक्टिस करणाऱ्या ज्येष्ठ वकील ॲड. स्वाती यादवाडकर यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी रोजच्या अनुभवावर आधारित त्यांची निरीक्षणं मांडली. त्या म्हणतात, ‘सध्याच्या काळामध्ये घटस्फोट घेणे ही नवीन बाब राहिलेली नाही. दोन व्यक्तींचे एकमेकांशी पटत नसेल तर शक्यतो सामंजस्याने मोकळे होण्याकडं तरुण पिढीचा कल दिसून येतो. एकदा घटस्फोट झाला म्हणून आयुष्यभर मी एकट्यानेच राहण्याची आवश्यकता नाही, ही पण बाब त्या दोघांना किंवा त्यांच्या घरच्यांना पचनी पडलेली आहे. त्यामुळे घटस्फोटितांचे पुनर्विवाहदेखील लक्षणीय प्रमाणात वाढलेले आहेत. कायद्याचे बऱ्यापैकी ज्ञान म्हणू या अथवा कायद्याबाबतची जागरूकताही लोकांमध्ये आहे. याबाबतीतले कायदे आजकाल इंटरनेटच्या माध्यमातून सहज लोकांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे न्यायालयातून घटस्फोट मिळवणे ही सगळ्यांत सुरक्षित बाब आहे. हे लोकांना पटलेलं आहे. पुन्हा एकदा लग्न करताना कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब करायचा आहे. हेही प्रकर्षाने लक्षात ठेवलं जातं. यापूर्वी आपल्याकडे घटस्फोट होत आहे ही बाब अतिशय न्यूनगंडाची किंवा समाजात वावरताना आपलं काहीतरी मोठं चुकलंय अशी होती. घटस्फोट घेतलाय हे लोक लपवायचे. आता घटस्फोटितांच्या पुनर्विवाहासाठीची पण विवाह मंडळं आहेत.’
‘दुसरा विवाह करताना एक गोष्ट समोर नक्की असते, की या जोडप्याला ‘आपल्याला नक्की काय नको आहे,’ हे आधीच समजलेलं असतं,’ असं नमूद करून ॲड. यादवाडकर सांगतात, “गेल्या २५ वर्षांत कौटुंबिक न्यायालयात प्रॅक्टिस करताना मला हे लक्षात आलं आहे. की दुसऱ्यांदा झालेला विवाह हा बऱ्यापैकी टिकून राहतो. गंमत म्हणजे घटस्फोट झाला, की अनेक पक्षकार किंवा त्यांचे आई-वडीलच मला ‘तुमच्याकडे असलेल्या पक्षकारांपैकी एखादी घटस्फोटित चांगली मुलगी किंवा मुलगा आम्हाला सुचवा,’ असं म्हणतात. त्यामुळे माणसाच्या नैसर्गिक, सामाजिक, भावनिक गरजा पूर्ण होऊन त्याला चांगल आयुष्य जगायचं असेल तर त्याने त्याच्या इच्छेप्रमाणे जोडीदार निवडून त्याच्यासोबत शांतपणे राहावं, ही गोष्ट घटस्फोटित मुलाचे-मुलीचे आई-वडील, समाज यांनी सहजपणे स्वीकारलेली आहे. अशावे ळी जर आधीच्या लग्नापासून मुलं-मुली असतील तर त्यांचाही विचार सामंजस्याने केला जातो. तितक्याच मोठ्या मनाने नवीन जोडीदार ह्या मुलांबाबत विचार करतात त्यावर मार्ग काढतात.”
“लग्नसंस्था जरी सामाजिक गरजेतून निर्माण झालेली आणि कुटुंबव्यवस्थेला प्राधान्य देणारी बाब असली तरी पुनर्विवाहदेखील सामान्य माणसांसाठी नवीन राहिलेला नाही. घटस्फोट झाल्यानंतर ७० टक्के मुलं-मुली नव्याने संसारात थाटतात दुसरे लग्नही समाजासमोर करतात. त्याबाबतीत कुठलाही गंड बाळगत नाहीत,” असं निरीक्षण नोंदवून ॲड. यादवाडकर सांगतात, “कुटुंबव्यवस्था टिकून राहायची असेल तर घटस्फोटितांचे पुनर्विवाह ही गोष्ट सहज स्वीकारली गेली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला त्याला हवं तसं जगण्याचा हक्क आहे . त्यालाही त्याचे आयुष्य एकदाच मिळते. जोडीदाराला, इतरांना अथवा समाजाला त्रास होणार नसेल तर व्यक्तिगत आयुष्यात कायदेशीर मार्गाने एखादी व्यक्ती तिच्या वैवाहिक जीवनाचे निर्णय घेत असेल तर त्याबाबत दूषणे देण्याचा अधिकार कायदा कोणालाही देत नाही. नवीन पिढी याबाबत अतिशय स्वच्छपणे, मोकळेपणे ,स्पष्टपणे विचार करते आणि निर्णय घेते, असा माझा अनुभव आहे.”
नव्या पिढीचा दृष्टिकोन यातून स्पष्ट होतो. लग्न या विषयाबद्दलचे आपले मूळचे पारंपरिक विचार त्यांनी केव्हाच त्यागले आहेत आणि नव्या, स्वच्छ मनाने या सर्व नात्यांकडं पाहायला सुरुवात केली आहे, हे यातून दिसून येतं. लग्नसंस्थेचं महत्त्व कायम आहे हेही यातून अधोरेखित होतं. कुणाच्या तरी तिसऱ्या लग्नाची चर्चा करता करता आपल्या समाजासमोर हा आरसा धरला तर त्यातूनही काही लग्नं वाचण्याची आणि काही नव्यानं घडण्याची शक्यता आहे. हेही नसे थोडके!

---

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, मैफल पुरवणी (पुणे) - ११ जुलै २०२६)

---

2 Jul 2026

फेसबुकवरचे छोटे रिव्ह्यू - भाग २

(काही काही सिनेमांचे त्या त्या वेळी फेसबुकवर छोटे रिव्ह्यू लिहिले होते. ते ब्लॉगवर एकत्र असावेत, म्हणून इथे शेअर करतो आहे. फेसबुकवर काही वेळा ते हरवूनही जातात. इथे चांगले दस्तावेजीकरण होते, म्हणूनही...)

---

१. वेटिंग
----------

वाट पाहण्याची जीवघेणी गोष्ट...
--------------------------------------

अनू मेनन हिचा 'वेटिंग' हा ९८ मिनिटांचा नवा हिंग्लिश सिनेमा म्हणजे वाट पाहण्याची एक जीवघेणी गोष्ट आहे. शिव नटराज (नसीरुद्दीन शाह) या कोचीमधल्या प्राध्यापकाची पत्नी आठ महिने तेथील हॉस्पिटलमध्ये कोमात आहे. योगायोगानं मुंबईतल्या रजत देशपांडेला काही कामानिमित्त तो कोचीत आला असताना अपघात होतो आणि तोही याच हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल होतो. त्याची पत्नी तारा (कल्की कोएच्लिन) तातडीनं तिथं येते. तिथं विमनस्क अवस्थेत ती बसलेली असताना तिची भेट शिव नटराजांशी होते. दोघांचीही अवस्था सारखीच असते. दोघांमध्ये अर्थातच अनेक बाबतीत फरक असतात. पिढीचा फरक, भाषेचा फरक, परिस्थितीशी दोन हात करण्यातला फरक... नातेसंबंधांकडं पाहण्याचा दृष्टिकोन सगळं सगळं भिन्न असतं. तरी जगण्याच्या आशेचा एक चिवट धागा दोघांना एका पातळीवर आणतो. या दोघांच्या वाट पाहण्याचीच ही जीवघेणी गोष्ट आहे. अनू मेनननं सटल पातळीवर अनेक जागा छान भरल्या आहेत. नसीरसारखा दमदार कलाकार असल्यानं एरवी अत्यंत संथ वाटणारी ही गोष्ट आपण शेवटपर्यंत इंटरेस्टनं पाहू शकतो. कल्कीनंही छान काम केलंय. अशा जीवघेण्या आजारात आपले जीवलग सापडले, की माणूस पाच स्थितींमधून जातो, हे नसीरुद्दीन शाहनं एका दृश्यात छान सांगितलंय. पहिली अवस्था असते, डिनायल.... हे आपल्याच बाबतीत झालंय हे स्वीकारायलाच आपण तयार नसतो... मग दुसरी अवस्था असते, अँगर... झाल्या गोष्टींबाबत आपल्याला सर्वांचा राग राग येऊ लागतो... मग तिसरी अवस्था असते बार्गेनिंग... इथं आपण आस्तिक असू तर देवाशी वाटाघाटी सुरू करतो... नास्तिक असू तर आस्तिक व्हायला लागतो...चौथी स्थिती असते, डिप्रेशन... काहीच होत नाही म्हटल्यावर आपण नैराश्यग्रस्त होतो.... आणि पाचवी अवस्था असते ॲक्सेप्टन्स.... स्वीकार... जे घडलंय त्याचा आपण शांतपणे स्वीकार करतो. त्यानंतर माणूस माझ्यासारख्या 'झेन' पदाला पोचतो, असं शिव ताराला सांगतो. अशा अनेक छोट्या छोट्या संवादांतून, व्यामिश्र जगण्यातला साधा-सरळ समजूतदारपणा नकळत सांगणारा, शिकवणारा हा सिनेमा आहे.
कदाचित आठवड्यानंतर थिएटरला नसेलच. मी शुक्रवारी सिटीप्राइड अभिरुचीला गेलो. तेव्हा मी एकमेव प्रेक्षक असल्यानं शो झालाच नाही. मग आज सिटीप्राइड कोथरूडला नेटानं जाऊन पाहिलाच. पण समाधान वाटलं. पूर्वीच्या काळी या सिनेमाला कुणी समांतर किंवा आर्ट सिनेमा म्हटलं असतं. पण आज हा मुख्य धारेतलाच सिनेमा आहे. भले त्याची स्ट्रीम खूप छोटीशी असो...
आणि हे खूप छान आहे!

(दर्जा - साडेतीन स्टार) (एक पूर्ण स्टार नसीरसाठी...)

(२-६-२०१६, फेसबुक)

---

२. गली बॉय
--------------

हार्ड लक, बॉय!
-------------------

झोया अख्तर ही माझी आवडती दिग्दर्शिका आहे. तिचे ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आणि ‘दिल धडकने दो’ हे दोन्ही सिनेमे मला आवडले. ‘गली बॉय’ हा तिचा ताजा चित्रपट आता प्रदर्शित झालाय. रणवीरसिंह आणि आलिया भट प्रमुख भूमिकांत आणि झोयाचं दिग्दर्शन यामुळं हा सिनेमा पाहायची उत्सुकता होती. (सिनेमा पाहण्याच्या आधी त्याचा कुठलाच रिव्ह्यू मी वाचत नाही. पण या सिनेमाचे रिव्ह्यू चांगले आलेयत एवढं तर कळतंच...) पण प्रत्यक्षात ‘गली बॉय’ बघितल्यावर माझा भ्रमनिरास झाला. हा सिनेमा आवडून घेण्याचा प्रयत्न मध्यंतरापर्यंत मी केला; पण उत्तरार्धात मात्र मनानं नि:संदिग्ध कौल दिला, की नाही! बात कुछ जमी नहीं! हा सिनेमा आपल्याला भिडत नाही.
म्हणजे झोयाला या सिनेमात काय मांडायचंय ते मला कळलं. सक्सेस स्टोरी पाहायला आपल्याला आवडतेच. पण ती गोष्ट पाहताना त्या पात्रांसोबत आपलाही जो समांतर प्रवास व्हायला हवा ना, तो इथं झाला नाही. मी त्या पात्रांशी कुठलाही जैव संबंध प्रस्थापित करू शकलो नाही. या सिनेमातल्या कथाविषयाशी माझा भावनिक कनेक्ट शून्य होता, म्हणून असं झालं का? पण मग हा निकष इतर अनेक सिनेमांनाही लावला, तर चुकीचा ठरतो. तेव्हा तसं नसावं. मग नक्की काय झालं? रणवीर, आलिया आणि इतर पात्रं ज्या पर्यावरणात वावरतात, ते पर्यावरण (धारावी) इतर अनेक सिनेमांत अनेक वेळा पाहिलं आहे. ‘सलाम बॉम्बे’, ‘स्लमडॉग मिलेनिअर’सारख्या चित्रपटांतून ते प्रभावीपणे दिसलंही आहे. या सिनेमात मात्र रणवीरचा ध्यास आणि त्या ध्येयाकडचा प्रवास मनाची पकड घेतनाही. रणवीरचे मित्र, त्याचं कुटुंब, आलियाबरोबरचा त्याचा रोमान्स यात सिनेमाचा पहिला बराचसा भाग खर्च झाला आहे. या सगळ्यांत त्याची पॅशन, रॅपबद्दलची असोशी थोडी बॅकट्रॅकला जाते. उत्तरार्धातही हा विस्कळितपणा कायम राहतो. मधेच कल्कीचा ट्रॅक येतो. रणवीरच्या कुटुंबातील अडचणी समोर येतात. शेवटी आपलं ध्येय गाठण्यासाठी रणवीर मित्रासोबत गाड्या चोरायला लागतो, तेव्हा तर आणखीच डिस्ट्रॅक्ट व्हायला झालं. शिवाय रॅप संस्कृतीशी कुठलाच कनेक्ट नसल्यानं मला तरी त्याच्या या प्रवासात भावनिकदृष्ट्या गुंतता आलं नाही.
अर्थात, रणवीरनं काम उत्तमच केलंय. आलिया पण बहारदार! रणवीर-आलियाची 'चुंबनकेमिस्ट्री' चांगलीच जमली आहे. एवढं सगळं असलं, तरी बात कुछ जमी नही, असंच वाटत राहिलं... मग स्वत:लाच ‘हार्ड लक, बॉय!’ म्हणावंसं वाटलं...

(२०-२-२०१९, फेसबुक)

--- 

३. ओह बेबी
---------------------

वयं मोठं खोटम्
--------------------

‘जानू’ पाहिल्यानंतर यातली अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिचा ‘ओह बेबी’ हा आणखी एक तेलगू चित्रपट बघितला. ही एक फँटसी आहे. सत्तर वर्षांच्या एक आजीबाई एका फोटो स्टुडिओत जातात आणि चमत्कार होऊन २४ वर्षांच्या होतात. यात २४ वर्षांच्या तरुणीची भूमिका अर्थातच समंथानं केली आहे. यात तिला मुक्त संचाराला भरपूर वाव आहे आणि तिनं या रोलमध्ये अक्षरश: धमाल केलीय. तिला ती ७० वर्षांची म्हातारी आहे हे माहिती असतं. पण तिचं शरीर २४ वर्षांच्या तरुणीचं झालेलं असतं. अशी ही तरुणी तिच्या घरी परत जाते, तेव्हा काय धमाल येते हे सगळं यात आहे. तिच्या नातवाबरोबर ती रॉक बँड स्पर्धेत भाग घेते. तिथला चॅनेलचा प्रमुख तरुण तिच्या प्रेमात पडतो. मध्यंतरात तिच्या नवऱ्याला मात्र ती कोण आहे हे कळतं. दाक्षिणात्य चित्रपटांत फॅमिली ड्रामात असतो तो सगळा मसाला यात भरलेला आहे. ही अगदीच निखळ व्यावसायिक फिल्म आहे आणि ती आपलं छान मनोरंजन करते. त्या म्हातारीतली ‘आई’ सदैव जागृत असते आणि ती लहान मुलगी दिसत असताना वयानं मोठ्या मुलासाठीची तिची तळमळ हे सगळं यात फार मस्त आलंय. चॅनेलमधल्या हिरोसोबत ती त्याच्या घरी जाते, दारू पिते आणि तिथंच झोपते तो प्रसंग मुळातूनच बघण्यासारखा. तिच्या नवऱ्याला जेव्हा कळतं, ही मुलगी आपलीच सत्तरीतली बायको आहे, तेव्हा ती त्याला एक वाक्य सांगते - ती म्हणते - मी आत्ता तरुण आहे तर सगळ्या तरुणांच्या नजरा माझ्याकडं खिळतात. ते मला सुंदर म्हणतात. ते एक वाक्य ऐकण्यासाठी मी सदैव आतुरलेले असते.... - या आणि अशाच तरल भावनांच्या गुंफणीसाठी, वयाच्या अदलाबदलीतल्या गमतीसाठी नक्की बघावा असा हा चित्रपट आहे. समंथासोबतच लक्ष्मी या ज्येष्ठ अभिनेत्रीनं यातली खमकी म्हातारी फारच जबरदस्त साकारली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन बी. व्ही. नंदिनी रेड्डी यांनी - म्हणजे एका महिलेनंच - केलं आहे, हे सांगितल्यावर यातल्या फँटसी किती झकास सादर झाली असेल, हे वेगळं सांगायला नकोच.

(दर्जा - साडेतीन स्टार)

(२०-७-२०२०, फेसबुक)

------

28 Jun 2026

फेसबुकवरचे छोटे रिव्ह्यू - भाग १

(काही काही सिनेमांचे त्या त्या वेळी फेसबुकवर छोटे रिव्ह्यू लिहिले होते. ते ब्लॉगवर एकत्र असावेत, म्हणून इथे शेअर करतो आहे. फेसबुकवर काही वेळा ते हरवूनही जातात. इथे चांगले दस्तावेजीकरण होते, म्हणूनही...)

---------

१. मुळशी पॅटर्न
------------------


आरारारारारारा...
---------------------

''पुण्यालगतच्या जमिनींना सोन्याचा भाव आल्यानं चहूबाजूंना गुंठामंत्र्यांचं पीक वाढलं. शून्य कर्तृत्व असताना वाडवडिलांच्या पुण्याईवर हाती जबर पैसा आला. या पैशांचं करायचं काय, हा प्रश्नच होता. मग चुकीच्या दिशांनी त्या पैशाला वाटा फुटू लागल्या. ‘इझी मनी’नं इथल्या भवतालातल्या शांततेचं अपहरण केलं. अनाचार माजला. व्यसनांची संगत लागली. त्यामुळं डोकं जाग्यावर राहिलं नाही. मग गुन्हे घडायला कितीसा अवकाश उरणार? सध्या पुण्याच्या आजूबाजूला हेच होताना दिसतंय. शहरातल्या आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातल्या जाणत्यांना याची खंत वाटते आहे. पण वारकरी संप्रदायाची शिकवण असलेल्या या जुन्या सालस, पापभिरू पिढीचा आता नव्या पिढीला धाक उरला नाही. आपण या सगळ्या व्यवस्थेत ‘आइटसाइडर’ होत चालल्याची जाणीव आता त्यांना अंतर्बाह्य पोखरते आहे....''

(- ‘पुणं बदलतंय... खरंच?’ या ‘मटा पुणे आवृत्ती विशेष दिवाळी अंका’तील माझ्या लेखातून)

.....

प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा सिनेमा एक्झॅक्टली ही वर नमूद केलेली गोष्ट दाखवतो. मात्र, अडीच तासांचा हा सिनेमा म्हणावी तशी मनाची पकड घेत नाही. समकालीन विषयांना भिडणारे सिनेमे मराठीत येत नाहीत, अशी पूर्वी तक्रार असायची. आता या सिनेमामुळं तशी तक्रार करायला जागा नाही, हे खरं. मात्र, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गंभीर बदलांचं चित्रण करताना गुन्हेगारीपटांची ठरलेली लोकप्रिय वळणं टाळण्याचा मोह दिग्दर्शकाला आवरता आलेला नाही. शिवाय फ्लॅशबॅक तंत्राविषयी असलेलं दिग्दर्शकाचं ऑब्सेशन ही कथा सांगताना अडथळ्याचं ठरलं आहे. सलग जमिनीचे तुकडे तुकडे पडल्यावर शेतकऱ्याला जेवढं दु:ख होईल, तेवढंच दु:ख सिनेमाप्रेमी प्रेक्षकाला यातली गंभीर कथा तुकड्या-तुकड्यानं पाहताना होतं. प्रवीण तरडे यांचा पहिला ‘देऊळ बंद’ हा सिनेमा मला आवडला होता. त्यामुळं या दिग्दर्शकाकडून अपेक्षा वाढल्या होत्या. पण ‘मुळशी पॅटर्न’ त्या अपेक्षांना न्याय देत नाही. रामगोपाल वर्मा ते अनुराग कश्यप आदी मंडळींनी हिंदी सिनेमात सेट केलेल्या ट्रेंडची मराठी आवृत्ती काढण्यातच दिग्दर्शक (कदाचित नकळतपणे) रमलेला वाटला. उदा. यातलं सुनील अभ्यंकर यांनी साकारलेलं वकिलाचं पात्र. अभ्यंकरांनी हा वकील फार जोरदार उभा केला आहे, तरी राहून राहून तो ‘सत्या’मधल्या मकरंद देशपांडेंनी साकारलेल्या मुळे वकिलाची आठवण करून देतो. उपेंद्र लिमये यांच्या अभिनयाची चिरपरिचित शैली त्यांच्या यातल्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेला मारक ठरली आहे. सुरुवातीचं निवेदन करतानाचा त्यांचा तो धीर-गंभीर आवाज विषय सेट करणारा वाटतो, पण त्याच वेळी अधिकाऱ्याच्या भूमिकेत ते एकाच पट्टीत जी संवादफेक करतात, ती नंतर कंटाळवाणी वाटू लागते. तीच गोष्ट महेश मांजरेकर यांच्या पात्राची. हमाली करणारा एक शेतकरी त्यांनी उभा केला आहे. मात्र, त्यांची संवादफेक खटकल्याशिवाय राहत नाही.
कथा फ्लॅशबॅक तंत्रानं सतत मागं-पुढं होत असल्यानं यातल्या राहुल या न-नायकापासून ते कुठलंच पात्र धड उभं राहत नाही. अपवाद मोहन जोशी यांनी साकारलेल्या राहुलच्या वडिलांच्या भूमिकेचा. ही भूमिका मोहन जोशी यांनी कमालीच्या ताकदीनं उभी केली आहे. चित्रपटात हिंसेचे, मारामारीचे अनेक रक्तरंजित प्रसंग आहेत. त्यांची खरंच आवश्यकता होती का, असा प्रश्न पडतो.
काही प्रसंग मात्र जमले आहेत. त्यात क्लायमॅक्सचा प्रसंग, तसंच पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाला उपेंद्र लिमये कृतीतून समजावून सांगतो तो प्रसंग असे प्रसंग जमले आहेत. गोवऱ्या थापलेली स्कॉर्पिओ दाखवण्याची आयडिया भन्नाट. सुरुवातीला ड्रोनद्वारे दिसणारं आपलंच शहर अगदी परकं परकं भासतं, हा अनुभव विलक्षण होता.
देवेंद्र गायकवाड आणि रमेश परदेशी यांना ओम भुतकरसमोर पर्यायी गुंड म्हणून उभं करण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न पारच फसला आहे.
हा सिनेमा पाहावा तो ओम भुतकरसाठी. हा भविष्यातला मोठा अभिनेता आहे, याची झलक या सिनेमानं दाखविली आहे. ओमच्या टॅलेंटविषयी शंकाच नव्हती. पण त्या गुणवत्तेला न्याय देणारा हा भावखाऊ रोल त्याला मिळाला आणि त्यानंही त्याचं चीज करून दाखवलंय.
या सिनेमात आरारारारारा नावाचं एक गाणं येतं. हा सिनेमा पाहून समाजातल्या वाईट प्रवृत्तींविषयी अशीच भावना मनात निर्माण होते आणि तेच या चित्रपटाचं यश आहे. 

---

(दर्जा - तीन स्टार)

(२८-११-२०१८, फेसबुक)

----

२. दी ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर
---------------------------------------


(नॉट सो) ‘ॲक्सिडेंटल’ मूव्ही
------------------------------------

‘दी ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर‘ हा सिनेमा मला पाहायचा होता, याचं कारण डॉ. मनमोहनसिंग यांची सगळी दहाही वर्षांची कारकीर्द पत्रकार म्हणून अगदी डोळ्यांसमोर आहे. डॉ. सिंग सत्तेत आले तेव्हा मला पत्रकारितेत येऊन दहा वर्षे झाली होती. माझ्या कारकिर्दीची दहा ते वीस अशी दहा वर्षे डॉ. सिंग देशाचे पंतप्रधान होते. या कालावधीत मी एका पेपरमधून दुसऱ्या पेपरमध्ये रुजू झालो. पण बातम्या भाषांतरित करणे, लेख लिहिणे, स्फुटं लिहिणे, सदरं लिहिणे अशा अनेक माध्यमातून मी त्यांच्या कारकिर्दीविषयी बरी-वाईट मतं मांडली.
डॉ. सिंग यांचं पंतप्रधानपद गेलं, त्याच वर्षी संजय बारू यांचं ‘दी ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हे पुस्तक बाजारात आलं. काही कारणानं माझं हे पुस्तक वाचायचं राहून जातंय. अजूनही मी ते वाचलेलं नाही. पण जेव्हा या पुस्तकावर आधारित सिनेमा येतोय, हे कळलं तेव्हाच मी तो पाहायचा निश्चय केला. त्यातही अनुपम खेरसारखा अभिनेता डॉ. सिंग यांचं काम करतोय हे पाहिल्यावर तर तो पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढली. नंतर संजय बारू यांचं काम अक्षय खन्ना करतोय हे समजल्यावर तर मी पहिल्याच दिवशी हा सिनेमा पाहण्याचं ठरवलं. पण काही ना काही कारणानं मला बघायला वेळच होत नव्हता. अखेर काल (रविवारी) मी हा सिनेमा पाहिला. सिनेमा पाहिल्यावर सर्वांत प्रथम माझ्या मनात दाद उमटली ती अनुपम खेर यांच्यासाठी! खेर यांनी डॉ. सिंग यांची भूमिका फार उत्कृष्टपणे केली आहे, असं माझं मत झालं. अक्षय खन्नाही संजय बारूंच्या भूमिकेत अगदीच शोभून दिसलाय. या दोघांनीही हा सिनेमा नीट तोलून धरलाय. आणखी एक महत्त्वाची व्यक्ती या सिनेमात आहे. सोनिया गांधी यांच्या भूमिकेत सुझान बर्नर्ट या अभिनेत्रीनं सोनियांचं काम आणि दिसणं या दोन्ही गोष्टी चोख केल्या आहेत. राहुल गांधी म्हणून अर्जुन माथूर हा अभिनेता मात्र अजिबात शोभला नाही.
एखादा सिनेमा आपल्याला भिडण्यासाठी, भावण्यासाठी आणखीही बऱ्याच गोष्टींची गरज असते. त्या गोष्टींचा या सिनेमात अभाव आहे. विजय रत्नाकर गुट्टे (की गुत्ते?) या नावाच्या व्यक्तीनं हा सिनेमा दिग्दर्शित केलाय. मात्र, दिग्दर्शनातला नवखेपणा जाणवतो. मी पुस्तक वाचलेलं नाही, मात्र सिनेमा पुस्तकाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो, असं दिसतं. पण त्यामुळं तो संजय बारू यांच्याच नजरेतून दिसत राहतो. आपल्या देशासाठी डॉ. सिंग यांची दहा वर्षांची कारकीर्द अगदी महत्त्वाची होती. अर्थव्यवस्थेच्या चढ-उतारांसह अणुकरार, ‘टू जी’पासून ते कॉमनवेल्थ गेम्सपर्यंत अनेक घोटाळे असं बरंच काही या काळात घडलं. मात्र, सिनेमात या सगळ्या गोष्टींना ओझरता स्पर्श करतो आणि पुढं जातो. या सिनेमाचा सगळा भर आहे तो सोनिया आणि राहुल या ‘गांधी’ लोकांनी डॉ. सिंग यांना एखाद्या कठपुतळीसारखं कसं नाचवलं हे सांगण्याचा! अर्थात हे वास्तव नाही असं कुणी म्हणणार नाही. मात्र, हा सिनेमा प्रदर्शित होण्याचा काळ आणि त्यातला दिग्दर्शक सांगू पाहत असलेला आशय यांची संगती लावण्याचा प्रयत्न केला, तर हा सिनेमा (‘नॉट सो) ॲक्सिडेंटल मूव्ही’ आहे, असं वाटल्यावाचून राहवत नाही.
या सिनेमानं सर्व राजकारणी लोकांची थेट नावं घेण्याचं धाडस केलंय. मात्र, काही ठिकाणी ‘फॅमिली’ हा शब्द म्यूट करण्यात आला आहे, तर आणखी एका ठिकाणी बारूंच्या तोंडी असलेलं एक संपूर्ण वाक्यच म्यूट केल्याचं जाणवतं. राहुल गांधी व सोनिया गांधी यांचा जवळपास खलनायक म्हणून दाखवण्याचा प्रयत्न जाणवला आणि सिनेमा ‘ॲक्सिडेंटल’ का नाही, तेही कळलं.
डॉ. सिंग यांच्याविषयी कमालीचा आदर वाटतो. एवढा विद्वान माणूस देशाचा पंतप्रधान झाला, पण त्यांना मनासारखी सत्ता राबवता आली नाही, हे सिनेमात सूचकपणे दाखवलंय. ते काही खोटं नाही. पत्रकार म्हणून यातल्या अनेक गोष्टींच्या बातम्या केल्या होत्या. ते प्रसंग सिनेमात पाहताना पडद्यामागे काय घडलं होतं, हे जाणून घेता आलं.
पण एकूण सिनेमा काही फार प्रभावी वाटत नाही, हेच खरं. त्याचं या वेळेला प्रदर्शित होणं ‘ॲक्सिडेंटल’ वाटत नाही, हेच तो प्रभावहीन वाटण्यामागंच ठळक कारण असावं, असं आता वाटतंय.
पण तरीही ज्यांना बघायचाय, त्यांनी जरूर पाहा. पत्रकार मंडळींनी तर नक्की पाहावा. 

---

(दर्जा - दोन स्टार)

---

(२१-१-२०१९, फेसबुक)

---

दुसरा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-----

8 Jun 2026

मेड इन इंडिया : ए टायटन स्टोरी - रिव्ह्यू

प्रेरणादायी ‘काळा’ची कहाणी
-----------------------------------


‘मेड इन इंडिया - ए टायटन स्टोरी’ ही 'ॲमेझॉन प्राइम’वरची वेब सीरीज ‘बिंज वॉच’ केल्यानंतर दोन गोष्टी आधी सांगितल्या पाहिजेत. एक म्हणजे ही वेब सीरीज प्रत्येक भारतीयाने बघितली पाहिजे. दुसरी गोष्ट, मला झेर्क्सेक्स  देसाई या माणसाविषयी याआधी काहीही माहिती नव्हती. अर्थात, टायटन या ब्रँडविषयी माहिती होती आणि टाटा या नावाचे आकर्षणही होते. या दोन्हींमुळेच कदाचित ही मालिका सलग पाहत गेलो आणि संपल्यावरच थांबलो.
टाटा उद्योगसमूहाविषयी भारतीय माणसाच्या मनात आपुलकी आणि जिव्हाळा आहे. याला काही कारणे आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून टाटा घराण्याचे भारतीय उद्योग क्षेत्रात असलेले अतुलनीय योगदान, टाटा उद्योगसमूहाची कार्यसंस्कृती, टाटा परिवारातील बहुतेक बड्या लोकांची जीवनदृष्टी आणि त्यांचा साधेपणा, ग्राहकांचा कमावलेला विश्वास, केवळ उद्योगांची उभारणी न करता देशाच्या हितासाठी अनेक संस्थांची उभारणी, लोकोपयोगी कामे आणि एकूणच देशप्रेम या सर्वांमुळे सर्वसामान्य भारतीय माणसाला ‘टाटा’ हे नाव प्रिय आहे. या उद्योगसमूहाचा अभिमान आहे. याच टाटांनी ऐंशीच्या दशकात संपूर्णपणे भारतात तयार होणारे घड्याळ निर्मिण्याचा ध्यास घेतला आणि तो तडीसही नेला. या प्रवासात आलेल्या अडचणी, देशाची व जगाची तत्कालीन मानसिकता, परदेशी उद्योगांच्या नजरेतून भारत, कामगार-उद्योगपती संबंध, उद्योगपती-राजकारणी संबंध, लायसन्स राज, काळाबाजार, तस्करी आदी अनेक गोष्टींतून ही कथा उलगडत जाते. या कथेचे नायक आहेत झेर्क्सेक्स देसाई. त्यांनीच ‘मेड इन इंडिया’ घड्याळाचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णही केले. हा प्रवास सोपा नव्हता. मात्र, देसाई यांचे बॉस आणि मित्र जे. आर. डी. टाटा यांचे त्यांना याबाबत खूप मोलाचे मार्गदर्शन झाले. टाटा मंडळी कसा विचार करतात, त्यांचा उद्योगाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता, यशस्वी लोक यशस्वी का असतात हे देसाई आणि जेआरडी यांच्या संवादांतून समजते. जेआरडींच्या तोंडी असणारे अनेक संवाद तर ‘सुभाषिते’ म्हणून मनावर कोरून ठेवावेत असे आहेत. हे सगळे संवाद मुळातूनच ऐकायला हवेत. एखादा ब्रँड शून्यातून उभा करताना काय काय प्रसंग येतात, त्यावर ही मंडळी आपल्या बुद्धिचातुर्याने कशी मात करतात; कधी चुकतात, तर कधी योग्य ठरतात; त्यांच्या वैयक्तिक आयुष्यांतील अडचणीवर कशी मात करतात हे सगळं दिग्दर्शक रॉबी ग्रेवाल आपल्याला तपशीलवार दाखवतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देसाई आणि त्यांचे सहकारी कधीही हिंमत हरत नाहीत. चुकांवर मात करून पुढे जाण्याचा मार्ग शोधत राहतात.
या सर्व कथेला ‘मेड इन इंडिया’ची जोड आहे आणि तो प्रवास खूप भावनाशील आहे. खरे तर कुठलाही उद्योग महणजे फायदा-तोट्याची रुक्ष गणिते आणि एकूणच रोखठोक व्यवहार. मात्र, टाटांच्या विचारसरणीत याला जोड असते ती संवेदनशीलतेची. परदेशांतील लोकांकडून अपमान झाला की टाटा मंडळींमधले अस्सल भारतीयत्व जागे होते आणि ते आपल्या कर्तृत्वाने या सर्वांना लक्षात राहील असे उत्तर देतात. मुंबईतील ताजमहाल हॉटेलची उभारणी कशी झाली हे आपल्याला माहिती आहे. टाटांच्या ‘टायटन’चा जन्मही असाच परदेशातून आलेल्या नकारातून झाला. पुढे या ब्रँडने एवढे यश मिळवले, की ज्या फ्रेंच घड्याळ कंपनीने (फावरलुबा) सुरुवातीला या ब्रँडला तंत्रज्ञान देण्यास नकार दिला होता, तीच कंपनी ‘टायटन’ने नंतर विकत घेतली. भारत सरकारच्या मालकीच्या ‘एचएमटी’ या उपक्रमाची घड्याळे तेव्हा भारतात अतिशय लोकप्रिय होती. मात्र, ती किल्लीची, मेकॅनिकल घड्याळे होती. टाटांनी क्वार्ट्झ तंत्रज्ञान आणून क्रांती केली. काळाच्या पुढचा विचार केला नाही, तर एखादा ब्रँड कसा नामशेष होतो आणि एखादा कसा तगून राहतो, याची ही दोन उदाहरणे. मालिकेत ‘जीएमटी’ नावाने येणाऱ्या एचएमटीची ही बाजूही यात नकळतपणे समोर येते.

टाटांनी ‘टायटन’ ब्रँड कसा उभा केला, याचा हा सर्व प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. तो पाहताना एक भारतीय म्हणून आपल्याला अतिशय अभिमान वाटत राहतो. भारताने १९८३ मध्ये पहिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला तो प्रसंग, किंवा महिला हॉकीतील यशावर आधारित ‘चक दे इंडिया’सारखा चित्रपट किंवा ‘इस्रो’ने चंद्रावर आपले यान उतरवणे या सर्व घटना आपल्याला जेवढ्या प्रेरणादायी आणि अभिमानास्पद वाटतात, त्याच जातकुळीतील ही ‘टायटन’ची ‘मेड इन इंडिया’ कहाणी आहे. सहा भागांच्या या मर्यादित मालिकेत बाजी मारून गेला आहे तो जिम सरभ हा अभिनेता. यापूर्वी ‘रॉकेट बॉइज’मध्ये आपण त्याला होमी भाभांची भूमिका उत्तमरीत्या निभावताना पाहिले आहे. एकूणच आता ऐतिहासिक पारशी वा गुजराती व्यक्तींच्या भूमिका करण्यासाठी जिम एकदम तयार आहे, असे दिसते. जेआरडींच्या भूमिकेत नसीरुद्दीन शहा अगदी शोभून दिसले आहेत. जेआरडींच्या व्यक्तिमत्त्वातला रुबाब, तो पारशी गोडवा आणि अनुभवाने चेहऱ्यावर आलेले शांत-शीतल तेज हे सर्व नसीरुद्दीन शहांसारखे कसलेले अभिनेते व्यवस्थित दाखवतात. (फक्त फ्रेंच उत्तम बोलता येत असलेले जेआरडी फ्रेंच कंपनीच्या मालकाशी दुभाषा घेऊन बोलताना दाखवले आहेत, हे खटकतं.) तीच गोष्ट जिम सरभच्या विगची. तो विग अगदी कृत्रिम दिसतो आणि अजिबात नीट नाही.
यात वैभव तत्त्ववादीने साकारलेली आकाश दीक्षित ही देसाईंच्या मित्राची व्यक्तिरेखा आहे. अशी काही व्यक्ती खरोखर होती की ही काल्पनिक व्यक्तिरेखा आहे याची कल्पना नाही. विनय कामत यांच्या पुस्तकावर ही वेबसीरीज बेतलेली आहे. त्यांनी पुस्तकात या कथनासाठी हे पात्र निर्मिले आहे का, हे माहिती नाही. याचे कारण मी मूळ पुस्तक वाचलेले नाही. वैभव तत्त्ववादीने त्याची भूमिका व्यवस्थित निभावली आहे. मात्र, त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव आकाश दीक्षित असताना आणि त्याच्या घरातले लोक मराठी बोलत असलेले दिसत असताना क्रेडिटमध्ये मात्र त्याच्या पात्राचे नाव ‘आकाश बन्सल’ असे लिहिलेले दिसते. ही चूक अक्षम्य आहे. यात मेघा म्हात्रे या पात्राच्या रूपाने आणखी एक मराठी पात्र आहे. तिच्या आईच्या छोट्याशा भूमिकेत प्रतीक्षा लोणकर दिसतात. ही मेघा आणि गौरव धर (जे वास्तवातील या कंपनीचे नंतरचे एमडी भास्कर भट आहेत...) यांच्या हळुवार प्रेमकहाणीचा साइड ट्रॅकही आपल्याला यात दिसत राहतो. गौरवचे काम करणाऱ्या अभिनेत्यानेही चांगले काम केले आहे.
‘टायटन’ हे नाव कसे सुचले, ‘टायटन’च्या टीव्हीवरच्या पहिल्या जाहिरातीसाठी मोझार्टची धून वापरण्याची कल्पना कशी सुचली, पहिल्या दोन कर्मचाऱ्यांच्या मुलाखती, तमिळनाडूत जमीन पाहण्यासाठी केलेली कसरत, बॉम्बे हाउसमधले वातावरण, तत्कालीन मुंबईतली नॉस्टॅल्जिक करणारी दृश्ये, चोरबाजारातील घड्याळांचा काळाबाजार, सुरुवातीला उत्तर भारतात घड्याळांचा खप कमी व दक्षिण भारतात जास्त का व त्याचे मिळालेले अनपेक्षित उत्तर, एका अनाहूत लग्नसमारंभात घुसून मार्केटिंग हेडने दाखवलेली ‘वेडिंग गिफ्ट’ म्हणून ‘टायटन’ देण्याची अभिनव कल्पना असे अनेक रंजक प्रसंग मालिकेत आहेत. त्यामुळे आपण सुमारे साडेपाच तासांच्या या प्रवासात चांगलेच गुंतून राहतो.
थोडक्यात, काही चुका वा त्रुटी सोडल्या तर एकूण ही मालिका निश्चित पाहावी अशी आहे. सध्या ‘मेड इन इंडिया’चा बोलबाला असताना, ऐंशीच्या दशकात, उदारीकरणाच्या आधी टाटा समूहातील एक व्यक्ती भारतीय बनावटीचे, काळाच्या पुढचे तंत्रज्ञान वापरणारे मनगटी घड्याळ तयार करण्याचा ध्यास कसा घेते आणि अनेक प्रयत्नांनी तो कसा यशस्वी करून दाखवते, याची ही प्रेरणादायी कहाणी आपण तर बघावीच; शिवाय आपल्या पुढच्या पिढीला, घरातील कुमारवयीन किंवा तरुण मुलांना तर आवर्जून दाखवावी.

---

(ओटीटी - ॲमेझॉन प्राइम)

---


29 May 2026

रोहन मैफल लेख - मोहनलाल भास्कर पुस्तक

स्पाय स्टोरीज - मी पाकिस्तानातील भारताचा हेर
---------------------------------------------------

थरारक अन् भयावह...
-------------------------

सध्या ‘धुरंधर’ हा नवा हिंदी सिनेमा गाजतो आहे. दोन भागांत प्रदर्शित झालेल्या या सिनेमात पाकिस्तानात जाऊन देशासाठी कामगिरी बजावणाऱ्या गुप्तहेराची कथा सांगण्यात आली आहे. हेरकथा फार पूर्वीपासून वाचकप्रिय आहेत. जगभरातल्या गुप्तहेरांचे नानाविध किस्से, अनुभव. त्यांचे चित्तथरारक जीवन यांचे आकर्षण सर्वसामान्य वाचकांना असते. एरवी जी गोष्ट आपण कल्पनेतही करू शकणार नाही, अशा गोष्टी ही हेरमंडळी लीलया करत असतात. तीही शत्रुदेशांच्या गोटात जाऊन! अतिशय हुशार मेंदू, ताकदवान शरीर, लवचीक अन् पाण्यासारखा स्वभाव, प्रचंड धैर्य, कष्ट वा जाच सोसण्याची शारीरिक व मानसिक तयारी अशा अनेक गुणांनी युक्त असलेल्या व्यक्तीलाच हेर म्हणून नेमलं जातं. त्यामुळं या हेरांच्या जीवनाचं, त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या चित्तचक्षुचमत्कारिक घटनांचं स्वाभाविक आकर्षण सर्वांनाच असतं. वाचकांची हीच भूक भागविण्यासाठी रोहन प्रकाशनानं ‘स्पाय स्टोरीज’ या मालिकेअंतर्गत जगभरातील नामवंत हेरकथा मराठीत अनुवादित करून वाचकांसमोर आणल्या आहेत. मोहनलाल भास्कर यांचं ‘मी पाकिस्तानातील भारताचा हेर’ हे पुस्तक याच मालिकेतील. मोहनलाल भास्कर यांच्या विलक्षण अनुभवांमुळे हे पुस्तक रंजक, वाचनीय आणि तितकेच थरारक झाले आहे. ऋजुता कर्णिक-गुप्ते यांनी मूळ पुस्तकाचा मराठीत प्रवाही अनुवाद केला आहे.
मोहनलाल भास्कर यांचा जन्म पंजाबमध्ये १९४२ मध्ये झाला. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर ते पाकिस्तानात गेले. तेथे त्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झाली. लाहोरच्या प्रसिद्ध कोट लखपत कारागृहापासून ते मुलतान, मियांवाली अशा वेगवेगळ्या शहरांतील तुरुंगात त्यांना ठेवण्यात आलं. या काळात त्यांच्याकडून माहिती काढून घेण्यासाठी त्यांच्यावर अनन्वित अत्याचार झाले, क्रूर असा छळ झाला. शत्रुदेशात हे अपेक्षितच. मात्र, त्यांना काही सहृदय पाकिस्तानी कैदी, अधिकारी, वॉर्डनही भेटले. या सर्व अनुभवांचे संचित त्यांनी या पुस्तकाद्वारे मांडले आहे. हे एकाच वेळी भयावह, थरारक, कारुण्यजनक अन् क्वचित कधी तरी ओठांवर हलकेसे हसू आणणारे असे झाले आहे. सिमला करारानंतर भारत व पाकिस्तान दरम्यान झालेल्या करारानुसार, दोन्ही देशांतील कैद्यांची देवाणघेवाण करण्यात आली. त्यात मोहनलाल यांची सुटका झाली आणि त्यांना सुदैवानं पुन्हा आपल्या मातृभूमीचं दर्शन घेता आलं. त्या अर्थानं ते सुदैवी ठरले, कारण हेरगिरी करणाऱ्या पाकिस्तानात बहुतांश वेळा मृत्युदंडाचीच शिक्षा झालेली आहे. ती शिक्षा ठोठावली की प्रत्यक्ष शिक्षेची अंमलबजावणी जरी झाली नाही, तरी तेथील तुरुंगात खितपत पडणे हेच नशिबी येते. ते जगणे एवढे खडतर असते, की त्याऐवजी लवकर फाशी झालेली बरी, असेच कैद्यांना वाटू लागते. काही कैद्यांना अटक येथील किल्ल्यात नेऊन ठेवतात. तिथून तर सुटका अशक्यच मानली जाते. मोहनलाल यांनी सुटकेनंतर भारतात कुटुंबीयांसमवेत चांगले जीवन व्यतीत केले. शिक्षकाची नोकरी केली. सन २००४ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
अर्थात हे पुस्तक वाचताना मोहनलाल यांचे हे अनुभव १९६५ ते १९७४ या काळातील, म्हणजे पन्नास वर्षांहून अधिक जुने आहेत, हे लक्षात घ्यावे लागते. दोन्ही देशांची तत्कालीन राजकीय, आर्थिक, सामाजिक स्थितीही लक्षात घ्यावी लागते. तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून केवळ १८ वर्षे झाली होती. दोन्ही देशांतील अनेक लोकांना स्वातंत्र्यपूर्व काळातील एकच असलेला देश चांगलाच स्मरणात होता किंवा तो काळ पाहिलेले अनेक लोक हयात होते. त्यामुळे दोन्ही देशांतील नागरिकांत एकमेकांबाबत जशी कट्टर विरोधाची भावना होती, तशीच ‘आपण एकच आहोत, फाळणीमुळं वेगळे झालेले भाऊ आहोत,’ अशीही भावना अनेक नागरिकांत, विशेषत: दोन भाग झालेल्या पंजाब प्रांतातील नागरिकांत तीव्रतेनं होती. मोहनलाल यांना जे काही चांगले अनुभव आले ते अशा लोकांकडून. बाकी पाकिस्तानातील तत्कालीन लष्करशाही, याह्या खान यांंची क्रूर राजवट, झुल्फिकार अली भुट्टो यांचा उदय, बांगलादेशचे युद्ध आदी सर्व गोष्टी मोहनलाल यांच्या पाकिस्तानी तुरुंगांतील वास्तव्यात घडल्या. या सर्व घटनांकडे ते अतिशय जागरूकपणे पाहत होते आणि त्या घटनांचा आपल्या परीने अन्वयार्थही लावत होते.
भास्कर ज्या कामासाठी पाकिस्तानात गेले होते, त्याविषयी त्यांनी या पुस्तकात काहीही लिहिलेले नाही आणि ते अपेक्षितच आहे. मात्र, पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमाविषयीची माहिती काढायला ते आले होते, असा पाकिस्तानी यंत्रणांचा त्यांना अटक केल्यापासून संशय होता. मोहनलाल यांना अटक झाली तीही अमरिकसिंह नावाच्या भारतीय माणसाच्या डबल एजंटगिरीमुळंच. या अमरिकसिंहचे पाकिस्तानी तुरुंगात पुढं काय हाल झाले हेही मोहनलाल यांनी लिहिलं आहे.
तेथील तुरुंगांत मोहनलाल यांना आलेले अनुभव हाच या पुस्तकाचा गाभा आहे. या अनुभवांविषयी मोहनलाल यांनी सविस्तर आणि तब्येतीत लिहिलं आहे. हे अनुभव वाचताना अनेकदा त्रास होतो. एवढा छळ होत असताना, मोहनलाल यांनी तो कसा काय सहन केला असेल, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. अशा देशभक्ताला आपण मनोमन सलाम करतो.  हे सर्व अनुभव मुळातूनच वाचले पाहिजेत. त्यासाठी हे पुस्तक वाचायला हवं.
ऋजुता कर्णिक-गुप्ते यांनी या पुस्तकाचा उत्तम व सुलभ अनुवाद केला आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना एक प्रवाहीपणा जाणवतो.
‘धुरंधर’ चित्रपटानंतर आपल्याकडं पाकिस्तानात जाऊन देशसेवा करणाऱ्या गुप्तहेरांविषयी विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे स्वत:ही पाकिस्तानात काही वर्षे हेर म्हणून काम करत होते. पुण्याचे माजी पोलिस आयुक्त जयंत उमराणीकर हेही पाकिस्तानात काही वर्षे होते. या सर्वांविषयीचा आपला आदर वाढवणारं असं हे पुस्तक चुकवू नये असंच आहे. 

---

(लेखक : मोहनलाल भास्कर, अनुवाद : ऋजुता कर्णिक-गुप्ते, रोहन प्रकाशन)

---

18 May 2026

रोहन मैफल लेख - दवणे यांची दोन पुस्तके

आठवणींचा सुरेल अल्बम
------------------------------

ज्येष्ठ कवी, लेखक प्रवीण दवणे यांची ‘शब्द जिवलग’ आणि ‘गाण्यामागच्या गोष्टी’ ही दोन पुस्तके रोहन प्रकाशनातर्फे नुकतीच प्रसिद्ध झाली आहेत. या पुस्तकांविषयी...

-----

शब्द जिवलग - प्रतिभावंत साहित्यिकांच्या सहवासात...
-------------------------------------------------------------

थोरांचा सहवास ही तशी दुर्मीळ आणि अप्राप्य गोष्ट आहे. त्यामुळेच ती ज्यांना भरपूर लाभते त्यांना नशीबवान मानलं जातं. प्रसिद्ध लेखक व कवी प्रवीण दवणे हे अशाच नशीबवान व्यक्तींपैकी एक म्हणायला हवेत. त्यांना आयुष्यात अनेक थोरमोठ्या साहित्यिकांचा सहवास लाभला. आज जे लेखक वा कवी केवळ आठवणींत उरले आहेत, त्यांच्या सान्निध्यात दवणेंना वावरायला मिळालं. त्यांच्याशी संवाद साधता आला, त्यांच्याशी पत्रव्यवहार करता आला आणि त्यांच्याकडून बरंच काही शिकताही आलं. अशा एकूण २४ दिग्गज साहित्यिकांबद्दल २० लेख दवणे यांनी लिहिले आहेत. त्यात कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, विंदा करंदीकर, पु. भा. भावे, दत्तो वामन पोतदार व लक्ष्मणशास्त्री जोशी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, दुर्गा भागवत, बा. भ. बोरकर, गंगाधर गाडगीळ, द. मा. मिरासदार, माधव मनोहर, प्राचार्य राम शेवाळकर, शं. ना. नवरे, सुरेश भट, यशवंत देव, शान्ता शेळके, मंगेश पाडगावकर, कविवर्य शंकर वैद्य, व. पु. काळे आणि अमृता प्रीतम, नारायण सुर्वे, रवींद्र पिंगे व अटलबिहारी वाजपेयी या थोरांचा समावेश आहे. ही सर्व व्यक्तिचित्रे दवणे यांनी अतिशय प्रेमाने आणि भक्तिभावाने रेखाटली आहेत. त्यामुळे त्यांची शीर्षकेही तशीच आहेत. पु. ल. देशपांडे यांच्यावरील लेखाला त्यांनी ‘माझं ‘पुलदैवत’’ असं म्हटलं आहे, तर शंकर वैद्य यांच्यावरील लेखाचं शीर्षक ‘मायेची शाल’ असं आहे. प्राचार्य राम शेवाळकर यांना लेखकाने ‘सरस्वती विद्यापीठाचे कुलगुरू’ म्हटलं आहे, तर दुर्गा भागवत यांच्यावरील लेखाला ‘साहित्ययोगिनी’ असं शीर्षक दिलं आहे.
हे लेख लिहिण्यामागची आपली प्रांजळ भूमिकाही दवणे यांनी मनोगतात मांडली आहे. ते लिहितात, ‘या साहित्यिकांची वाङ्मयीन थोरवी वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही. ती आहेच; पुन्हा पुन्हा त्यावर लिहिलं गेलं आहे. मात्र, ‘शब्द जिवलग’मध्ये त्यांच्या-माझ्या वैयक्तिक संवादाचा, सहवासातील वेगळ्या घटनांचा, त्यांच्या थोर असण्याच्या कारणांचा प्रवास आहे. ह्या दिग्गजांच्या भेटीतले हे क्षण केवळ व्यासपीठावरील कुणाच्या साक्षीने घडले नाहीत; तर कधी पत्रलेखन, कधी घरगुती भेटी, कधी साहित्यिक कार्यक्रमांचे निमित्त यातून अनेक दीपक्षण अवचित हाती आले. साहित्य रसिकांना तर ते वाचताना अनोखा आनंद मिळेलच; पण नव्या पिढीतील लेखकांना, अध्यापकांनाही त्यातून आता प्रत्यक्ष न भेटता येणाऱ्या ह्या वाङ्मयीन दीपस्तंभांची भेट होणार आहे.’
यातून दवणे यांची या थोर साहित्यिकांकडे पाहण्याची भक्तिभावाची दृष्टी अधोरेखित होते. हे लेख वाचताना या थोर मंडळींच्या आयुष्यातले लेखकाने अनुभवलेले मोजके क्षण व किस्सेवजा आठवणी पाहून आपणही त्या काळात जातो. पु. भा. भावे यांच्या सान्निध्यातल्या दवणे यांच्या आठवणी रंजक व रोचक आहेत. दत्तो वामन पोतदार यांना केवळच एकदाच भेटूनही त्यांचा कसा प्रभाव लहानग्या वयात पडला, हेही दवणे यांनी प्रभावीपणे मांडले आहे. विंदांसारख्या ज्येष्ठ कवीने दवणे यांच्या निवेदनातील चूक जाहीररीत्या कशी सांगितली होती, हेही लेखकाने आडपडदा न ठेवता मोकळेपणाने लिहिले आहे. एका दिवाळी अंकासाठी साहित्य देण्यास नकार देण्यासाठी दुर्गा भागवतांनी पोस्टकार्डवर केवळ ‘ना दु’ एवढंच लिहिल्याची गमतीशीर आठवणही त्यांच्यावरील लेखात आहे. ‘चांदण्याची मधुशाला’ हा बा. भ. बोरकरांवरचा रसाळ लेख तर मुळातूनच वाचण्यासारखा. माधव मनोहर यांचे लेखनिक म्हणून काम करताना दवणे यांना आलेले अनुभवही असेच वाचनीय आणि गमतीशीर आहेत.
सुमारे १७२ पानांच्या या पुस्तकात इतरही सर्व ज्येष्ठ साहित्यिकांच्या आठवणी दवणे यांनी आत्मीयतेनं सांगितल्या आहेत. त्या वाचताना महाराष्ट्राचा साहित्यसमृद्ध असा काळ डोळ्यांसमोरून झरझर जातो. त्यामुळे हे पुस्तक निश्चितच वाचनीय व रंजक झाले आहे.


-----


गाण्यामागच्या गोष्टी - माझ्या गाजलेल्या गाण्यांच्या सुरेल कहाण्या...
--------------------------------------------------------------------

प्रवीण दवणे यांनी या पुस्तकात शीर्षकात उल्लेख केल्याप्रमाणे त्यांच्या गाजलेल्या गाण्यांविषयीचे किस्से लिहिले आहेत. हे पुस्तक त्यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना अर्पण केले आहे. या पुस्तकाला प्रस्तावना ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांची आहे. दवणे यांनी मनोगतात या पुस्तकाच्या लेखनामागची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात ते म्हणतात, ‘गाणी प्रसारित होतात; मात्र साडेतीन-चार मिनिटांच्या गाण्यामागे दडलेल्या गोष्टी केवळ आठवणींच्या अल्बममध्येच उरतात, पुढे त्या विरतात. गीतरचना करताना सोबत कवीच्या तरलता आणि ललित लेखकाच्या संवेदनांचा टिपकागद मनात होता. म्हणूनच गाण्यामागच्या त्या अदृश्य गोष्टींना दृश्य रूप आलं. अर्थात, शब्दरूप! रसिकाला अशा कधी रंजक, तर कधी त्यातील अनवट वाटा जाणताना अंतर्मुख करणारा प्रयासही जाणवेल अशा ह्या खुद्द गीतकारानेच सांगितलेल्या घटना आहेत.’
एकूण सुमारे १५ प्रकरणांत लेखकाने या पुस्तकाची रचना केली आहे. दवणे १९८५ पासून चित्रपटांसाठी गीतलेखन करत आहेत. ‘ठकास महाठक’ हा त्यांचा पहिला चित्रपट. अगदी लहानपणापासून त्यांना कविता आणि गीतलेखनाचं वेड कसं लागलं आणि मराठी व हिंदी चित्रपट पाहून, त्यातील लोकप्रिय गीते ऐकून आपणही असं गीतकार व्हावं, हे स्वप्न कसं रुजलं आणि फुललं हे लेखक अगदी रंजकतेनं सांगतात. अगदी उमेदवारीच्या काळात शान्ता शेळके, शंकर वैद्य, श्रीनिवास खळे किंवा यशवंत देव यांच्यासारख्या दिग्गजांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभलं. चित्रपटातील गाणी लिहिणं हे एक वेगळंच कौशल्य आहे. चित्रपटातील प्रसंगानुसार, कथेच्या मागणीनुसार गीत लिहावं लागतं. अशा वेळी गीत म्हणून असलेला दर्जा टिकवणं आणि त्या प्रसंगालाही न्याय देणं ही दुहेरी कसरत गीतकाराला करावी लागते. त्यातून अनेकदा मजेशीर किस्से घडतात. अशा अनेक गमतीशीर गोष्टी, किस्से दवणे यांनी या पुस्तकात लिहिल्या आहेत. पहिल्या चित्रपट गीताची संधी कशी मिळाली, विश्वनाथ मोरेंसारख्या मनस्वी संगीतकाराने कशी परीक्षा पाहिली, लता मंगेशकरांनी गायलेल्या गाण्याच्या वेळीच निरोप न मिळाल्यानं फोटोची संधी कशी चुकली, उषा मंगेशकरांनी पहिल्यांदा गाणं का नाकारलं या आणि अशा अनेक किस्सेवजा हकीकतींनी दवणे यांनी या पुस्तकात रंगत आणली आहे. आपल्या आयुष्यात आलेल्या यशाच्या प्रसंगांबरोबरच अपयशाच्या, संघर्षाच्या, फसवणुकीच्या, अन्यायाच्या, गैरवागणुकीच्याही गोष्टी त्यांनी निर्मळपणे वाचकांसमोर ठेवल्या आहेत. चित्रपटसृष्टीसारख्या मोहमयी दुनियेत, डोंबिवलीसारख्या गावात, निम्नमध्यमवर्गीय कुटुंबात राहून कविता व गीतलेखनाचे वेड अंगात भिनवणारा तरुण केवढी मोठी मजल मारू शकतो, हे दवणे यांच्या या प्रांजळ कथनातून आपल्यासमोर येते. याशिवाय गेल्या ४० वर्षांत मराठी सिनेमांत आपण ऐकलेल्या अनेक लोकप्रिय, गाजलेल्या गीतांचे गीतकार प्रवीण दवणे आहेत, याचा सुखद साक्षात्कारही होतो. त्यासाठी तरी हे रंजक पुस्तक वाचायलाच हवे.

---

11 Apr 2026

वाराणसी-अयोध्या यात्रा - भाग ३

राम का गुणगान करिए...
------------------------------

५ एप्रिल २०२६, अयोध्या

आम्ही त्या मुख्य संकुलातून आत गेलो. आता मुख्य राम मंदिर अगदी समोर होतं. ते भव्य मंदिर आणि तिथलं अतिशय सुंदर प्रांगण बघून आनंद झाला. आमची रांग हळूहळू पुढं सरकत होती. पहिल्या पायरीला बहुतेक भाविक वाकून नमस्कार करत होते. मीही केला. एकेक पायरी चढताना आता मंदिराचं सर्व काम नीट दिसू लागलं. तिथले खांब, त्यावरचं कोरीव काम, विटकरी रंगाच्या त्या भिंती कमालीच्या सुंदर दिसत होत्या. एकेक पायरी चढून आम्ही मंदिराच्या मुख्य भागात प्रवेश केला, तेव्हा साधारण दोन्ही बाजूंनी चार-चार अशा आठ रांगा होत्या. स्टीलचे बार लावून रांग तयार  केली असल्याने एका वेळी एकच माणूस त्या रांगेत उभा राहू शकत होता. त्यामुळे रांग सुटसुटीत झाली होती व भराभर शिरत होती. जसजसे आम्ही मुख्य गाभाऱ्याच्या दिशेने जाऊ लागलो, तसतसा सर्व रांगांतून रामनामाचा मोठमोठ्यांदा गजर होऊ लागला. ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी तो परिसर दुमदुमून गेला. अगदी काही क्षणांतच आम्ही ‘रामलल्ला’च्या त्या भव्य मूर्तीसमोर होतो. २२ जानेवारी २०२४ रोजी टीव्हीवर पाहिलेली ती सावळ्यासुंदर बाल श्रीरामाची गोड मूर्ती आता अगदी समोर होती. मनोभावे दर्शन घेतलं. तिथं दोन महिला पोलिस उभ्या होत्या. त्या भाविकांना पुढं ढकलत होत्या. अर्थात रांग मागे बरीच होती. त्यामुळं आम्हीही केवळ क्षण-दोन क्षण समोर उभं राहून दर्शन घेतलं व पुढं सरकलो. जरा पुढं केल्यावर पुन्हा थोडं मागे येऊन परत एकदा डोळे भरून दर्शन घेतलं. तिथंही गर्दी व्हायला लागली तसं आणखी पोलिस आले आणि त्यांनी आम्हाला तिथून बाहेर जायला सांगितलं. एका मिनिटात आम्ही बाहेर होतो. पलीकडच्या बाजूने एक व्हीआयपी एंट्री असावी. शिवाय वरच्या मजल्यावर जाण्याचा रस्ताही तिथूनच होता. वर ‘राम दरबार’ होता, मात्र तिकडं काही आम्हाला जाता आलंच नाही. आम्ही बाहेर पडलो, ते थेट त्या संकुलातूनच बाहेर जाणाऱ्या रस्त्याने. तिथं एक जटायू प्रतिमा असं लिहिलेला बोर्ड होता. मात्र, ते काम पूर्ण व्हायचं असावं. अर्थात मंदिराचं काम करणाऱ्या एल अँड टी कंपनीला येत्या ३० एप्रिलपर्यंत सगळं काम संपवून बाहेर पडायला सांगितलं आहे, हे मी वाचलं होतं. मात्र, तरीही विस्तारासाठी बराच वाव ठेवल्याचं दिसलं. बाहेर पडल्यावर एक पाणपोई होती. तिथं बहुतेक जण पाणी प्यायला थांबले होते. उन्हामुळं तहान लागलीच होती. मीही तिथं जाऊन पाणी पिऊन आलो. इथून बाहेर जाण्याचा मार्गही वरून छत असलेला होता. त्यामुळं थेट उन्हाचा त्रास नव्हता. पुढे गेल्यावर डावीकडं लगेच स्वच्छतागृहही होतं. एकूण भाविकांच्या सोयीचा बराच विचार केलेला जाणवत होता. आम्ही पुढं जाऊन एका मोठ्या इमारतीत आलो. तिथंही बऱ्याच खुर्च्या होत्या. विमानतळावर किंवा रेल्वे स्थानकावर प्रतीक्षालय असतं, तसा तो हॉल होता. तिथं बरेच भाविक विश्रांती घेत होते. आम्ही फार दमलो नव्हतो. त्यामुळं लगेच लॉकरकडे गेलो. मगाशी समोरून वस्तू आत दिल्या होत्या, आता त्याच ठिकाणी मागील बाजूला असलेल्या खिडकीतून त्या परत घ्यायची सोय केली होती. हे फार चांगलं केलं होतं. वस्तू घेताना फार गर्दी नव्हती. त्यामुळं आमच्या वस्तू लगेच परत मिळाल्या. मग पुढं जाऊन चपलाही ताब्यात घेतल्या. तिथं एक मंडप टाकून सावलीची सोय केली होती. समोरच ‘सीता की रसोई भण्डार’ दिसलं. मग तिथं रांगेत उभं राहून द्रोणात गरमागरम खिचडी व ‘फ्रुटी’सारख्या पॅकिंगमधला ‘ओआरएस’चा पॅक घेतला. तो प्रसाद त्या मंडपात उभे राहूनच आम्ही खाल्ला. आपले लोक ते द्रोण तिथंच फेकत होते. वास्तविक तिथं प्लास्टिकची कचराकुंडी ठेवलेली होती. मात्र, लोक त्या कुंडीच्या खाली द्रोण फेकत होते. दोन बायका सतत ते झाडून तोच कचरा त्या कुंडीत टाकत होत्या. फार वाईट वाटलं ते दृश्य बघून. आपल्या लोकांना स्वच्छतेची ही बेसिक सवय कधी लागणार, राम जाणे!
तिथून बाहेर पडल्यावर लगेचच काही दुकानं होती. तिथं मग रामाचे धागे, फ्रिज मॅग्नेट, काही खाऊ अशी खरेदी केली. तिथं ‘बेंगलोर कॅफे’ दिसलं. मग वरच्या मजल्यावर जाऊन कोल्ड कॉफी घेतली. बरं वाटलं. आता आम्हाला हनुमान गढीला जायचं होतं. चालतच तिथपर्यंत गेलो. राम पथावर डाव्या बाजूला वळून छोट्या गल्लीतून आत जायचं होतं. रस्त्यावरूनच ती ‘गढी’ दिसत होती. इथं थोडं चढून जायचं होतं. खालपासूनच रांगेत गर्दी दिसत होती. आम्ही चपला खालीच एका दुकानदाराकडं काढल्या. वर जाऊ लागलो तसतशी गर्दी वाढू लागली. इथं राम मंदिराच्या अगदी उलट स्थिती होती. आत एक-दोन पोलिस होते; मात्र गर्दी त्यांच्याही नियंत्रणात नव्हती. अत्यंत रेटारेटीत कसंबसं बाजूनंच दर्शन घेऊन त्या रांगेतून बाहेर पडलो. पुन्हा प्रदक्षिणा मारून समोर आलो, तर तिकडं हनुमानाचं मुख आहे, हे कळलं. मग तिथूनच फोटो काढले व खाली उतरलो. मगाशी राम मंदिरात दर्शनाचा आलेला सुखद अनुभव आणि इथं हनुमान गढीला आलेला हा गर्दीचा अनुभव, अगदीच वेगळे होते.

खाली उतरून आता आम्हाला लता मंगेशकर चौकात जायचं होतं. मग मुख्य रस्त्यावर येऊन त्या गोल्फ कार्टमध्ये बसून आम्ही त्या भव्य वीणा असलेल्या चौकात गेलो. तिथं अपेक्षेप्रमाणे बरीच गर्दी होती. सगळ्यांना त्या वीणेबरोबर फोटो काढायचे होते. आम्हीही अर्थात काढले. (एक जाणवलेली गोष्ट म्हणजे त्या चौकात कुठेही लता मंगेशकरांच्या नावाचा फलक नव्हता. तो अयोध्येत इतरत्र एकदा दिसला. मात्र, त्या चौकात नव्हता.) तिथं उजव्या बाजूला रामकथा पार्क आणि डाव्या बाजूला राम की पैडी (पैडी की पौडी? पण तिकडं सगळीकडं ‘पैडी’ असंच लिहिलेलं होतं.) होती. रामकथा पार्क बंदच आहे, असं कळलं. तिथंच अलीकडं कोरियन राणी हो हिचं स्मारक दिसलं. तेही बांधकाम अपूर्ण होतं. मग आम्ही पुन्हा त्या ‘पैडी’कडं आलो. तिथं पाण्याच्या दोन्ही बाजूला चांगलं घाटासारखं बांधकाम केलं होतं. पाणी अगदीच घोटाभर होतं. त्यातून लोक इकडून तिकडं चालत जात होते. तिथं सुरुवातीलाच एक पाणीपुरी विकणारा मुलगा होता. मग आम्ही तिथं पाणीपुरी खाल्ली. शेजारी एक स्पेशल चहा देणारं दुकान होतं. त्या दुकानदारानं गुलाब पाकळ्या टाकून उकळलेला फर्मास चहा आम्हाला दिला. मजा आली. पुढं त्या भागाच्या दुसऱ्या टोकापर्यंत आम्ही चालत गेलो. तिथं एक लेसर शो होता. त्याआधी आम्ही पुढं शरयूच्या घाटावर गेलो. तिथं आरती सुरू होती. गर्दीही भरपूर होती. इथल्या नदीत खाली उतरायला नीट सोय नव्हती. मातीचा निसरडा उतार होता. त्यामुळं आम्ही खाली न जाता वरूनच तो सोहळा पाहिला. परत आलो, तर तो लेसर शो सुरू झाला होता. हरीश भिमानींच्या आवाजातलं निवेदन होतं. पाण्यापलीकडं असलेल्या इमारतींवर प्रकाशझोत टाकून हा शो दाखवला जात होता. मात्र, त्याचे स्पीकर लोक जिथं बसले होते, त्याच्यामागे होते. त्यामुळं नीट ऐकू येत नव्हतं. याशिवाय त्या परिसरात इतरत्र लाउडस्पीकर सुरू होते. ते आवाज मिक्स होत होते. त्यामुळं शो चांगला असूनही आम्हाला जरा बोअर झाला. मग आम्ही तिथून उठून आलो. पुन्हा ती चार सीटर ई-रिक्षा करून हनुमान गढीच्या बाजूला आलो. या रिक्षावाल्यांना बहुतेक त्या राम पथावरून जाण्याची परवानगी नाही. मग त्यानं समोरच्या लखलखत्या धर्म पथावरून एका बोळात रिक्षा घातली. बरंच फिरवून फिरवून त्यानं आम्हाला त्या राम पथाच्या बाजूच्या गल्लीत सोडलं. जाताना जुन्या अयोध्या गावाचं दर्शन घडलं. हे गाव इतर चार गावांसारखंच साधं होतं. 
आता आम्हाला दशरथ महाल, कनक भवन बघायला जायचं होतं. पुन्हा हनुमान गढीच्या बाजूनं पुढं गेलो. तिथंच तो दशरथ महाल होता. बाहेरचा दर्शनी भाग भव्य होता व तिथं बरीच लायटिंगही केलेली होती. आतमध्ये बरीच मोकळी जागा होती व पुढं मंदिर होतं. इथं त्या मूर्तींपुढं प्रत्यक्ष कीर्तनासारखं भजन वगैरे सुरू होतं. भाविकांची गर्दीही बरीच होती. तिथं थोडा वेळ थांबून मग चालतच शेजारच्या कनक भवनात गेलो. ही वास्तू म्हणे कैकेयीने सीतेला भेट दिली होती. इथंही साधारण तसंच चित्र होतं. त्या इमारतीचा दर्शनी भाग भव्य होता. शेजारी एक महादेवाचं देऊळ होतं. आत गेल्यावर मोकळी जागा व पुढं मंदिर. त्या वेळी नेमका त्या मूर्तींसमोर पडदा ओढला होता. हा ‘शयन समय’ एक तास होता असं कळलं. त्यानंतरच मूर्ती दिसणार होत्या. आम्हाला तेवढा वेळ नव्हता. बाहेर पडलो. त्या मोकळ्या जागेत एक छोटी देवळी होती. तिथं ‘भरताच्या पादुका’ होत्या असं समजलं. इथं जे दिसेल त्याला आणि चार लोक करतील त्याला नमस्कार करणे हे धोरण मी ठेवलं होतं. त्यानुसार तिथंही त्या पादुकांवर डोकं टेकवून आलो. इथं भिंतींवर बऱ्याच ठिकाणी ‘सीताराम’ अशी अक्षरं कोरली होती आणि बरेच भाविक ती अक्षरं येता-जाता गिरवत होते. विशेषत: महिला! यामागचं लॉजिक काही कळलं नाही. सीतेचं नाव रामाआधी घेतलं जातं, यासंबंधीची एक लोककथा पूर्वी ऐकली होती. आता आठवत नाही. त्याचा काही संदर्भ असू शकेल.
इथून निघालो. आता बराच उशीर झाला होता. आमच्या हॉटेलच्या गार्डन रेस्टॉरंटमध्ये जेवायचं आमचं ठरलं होतं. मग रिक्षा करून हॉटेलवर गेलो. तिथं रेस्टॉरंटला भरपूर गर्दी होती. गार्डन रेस्टॉरंटला फारसं कुणी बसलं नव्हते. तिथले दिवेही सुरू नव्हते. बाहेर भरपूर डास होते. त्यामुळं लोक बाहेर का बसले नसावेत, ते कळलंच. आम्हीही मग आत बसूनच जेवलो. रूमवर येऊन झोपलो. मात्र, ‘रामलल्ला’चं सुखद दर्शन झाल्यामुळं मन अगदी तृप्त होतं!

६ एप्रिल २०२६, अयोध्या/वाराणसी

आज आमच्यापैकी वृषाली काही कामानिमित्त इथूनच इंदूरला व तिथून पुण्याला परत जाणार होती. ब्रेकफास्ट केल्यांतर तिची कॅब आली. तिला बाय बाय करून आम्हीही थोड्या वेळाने पुन्हा राम मंदिर परिसरात निघालो. आमचं ‘चेक आउट’ ११ वाजता होतं. त्यामुळं बॅगा तिथंच ठेवून आम्ही बाहेर पडलो. राम मंदिर परिसरात जाऊन परत थोडी फार खरेदी केली. काल दशरथ महालाकडं जाताना ‘राम - भरत मिलाप’ अशी काही तरी पाटी बघितली होती. त्या छोट्याशा मंदिरात गेलो. तिथल्या पुजारीबुवांनी एकूणच आमच्याविषयी खूपच ममत्व दाखवलं. आम्ही एक किलो शिधा (किंमत फक्त ५०० रुपये) ठेवावा, असा एकूण त्यांचा आग्रह दिसला. आम्ही प्रत्येकी शंभर रुपये दिले व तिथून सुटका करून घेतली. बाहेर आलो तर ‘६ डी’ शोचा बोर्ड दिसला. तिथं एक मुलगा खाली रस्त्यावरच त्या ‘शो’ची जाहिरात करत होता. आधी डेमो पाहा; मग आवडला तरच तिकीट काढा, म्हणाला. आम्ही ते टेकाड थोडं चढून गेलो. तिथं एका काचेच्या मोठ्या खोलीत काही लोक त्या ‘व्हीआर’ इक्विपमेंटमधून शो पाहत होते. आम्हाला त्याने डेमो दिला. आम्हा तिघांनाही आवडला. मग प्रत्येकी दीडशे रुपयांचे तिकीट काढून आम्ही ‘अयोध्या व दीपोत्सव’ हा दहा-बारा मिनिटांचा शो निवडला. (तिथं वेगवेगळ्या देवस्थानांचे असे शो होते व ते साधारण याच कालावधीचे होते.) शो चांगला होता. थ्री डी इफेक्टमुळे अयोध्येतली वेगवेगळी ठिकाणं नीट बघता आली. हनुमान गढीवरचा हनुमान आम्हाला प्रत्यक्ष दर्शनाच्या वेळी दिसला नव्हता, तो इथं नीट दिसला. एकूण मजा आली. हा शो संपल्यावर समोरच असलेल्या राजद्वार मंदिरात गेलो. अयोध्या नरेशांनी सुमारे पाचशे वर्षांपूर्वी हे मंदिर बांधलं आहे. इथं रामाचा दरबार अशा स्थितीत सुंदर मूर्ती आहेत. या मंदिराचा कळस अयोध्येत सर्वांत उंच आहे. तिथं पुजारी म्हणून एक बाई होत्या. त्यांच्या परवानगीने मूर्तींचे फोटो काढले. तिथं थोडा वेळ बसलो. नंतर खाली येऊन त्या राम पथावर पुन्हा जरा भटकंती केली, राहिलेली खरेदी केली. तिथं उडुपी ते मुंबई रेस्टॉरंट होतं. ते आम्ही जातानाच हेरून ठेवलं होतं. मग तिकडंच जेवायला गेलो. रसम भात आणि रवा डोसा घेतला. तो भात भरपूर आला. त्यात माझं व साईचं पोट भरलंच. तिथून आम्ही थेट रिक्षा करून हॉटेलला गेलो. त्याला सांगितलं, की आम्हाला तिथून रेल्वे स्टेशनला सोड. मग हॉटेलला जाऊन बॅगा उचलल्या व थेट स्टेशनला गेलो. आमची ‘वंदे भारत’ साडेतीन वाजता होती. आम्ही दोन वाजताच स्टेशनला पोचलो होतो. मग त्या वरच्या प्रतीक्षालयात जाऊन बसलो. तासभर टाइमपास केला. तिथं माकडं भरपूर येत होती. आमच्याकडं खायचं काही नसल्यानं नंतर ती दूर गेली. साडेतीनला आम्ही खाली फलाटावर आलो. ट्रेन वेळेत आली. आमच्या डब्यात मराठी बोलणारे १५-१६ जण होते. त्यांच्यातल्या एक मावशी आमच्याशेजारीच आल्या. चौकशी केली तर त्यांचं माहेर जामखेडचं निघालं. छोटंसं जग! 
गाडी वेळेत निघाली, पण मधे लटकली. कुठं तरी ट्रॅकला आडव्या जाणाऱ्या रस्त्याचं काम सुरू होतं म्हणे.  त्यामुळं आमची गाडी एक तास एकाच जागी थांबली. त्यामुळं सव्वासहाला पोचणारी गाडी जवळपास सात वीसला वाराणसी स्टेशनला पोचली. मग तिथून पुन्हा रिक्षा करून हॉटेलला गेलो. साडेआठ वाजले होते. आम्हाला खरेदीसाठी आजचाच दिवस होता. मग लगेच आवरून बाहेर पडलो. काशी विश्वेश्वराच्या रस्त्याने पुढं गेलो. जाताना अदितीनं  (जोगळेकर) सांगितलेला तो ‘सरदारजी पापडवाले’ दिसला. मग तिथं जाऊन पापड आणि मिरचीचं लोणचं (अदितीचीच शिफारस) घेतलं. पुढं बनारसी फॅक्टरी साड्या थेट विकणारं एक छोटेखानी दुकान दिसलं. मग तिथून साड्या व जास्त करून ड्रेस मटेरियलची खरेदी झाली. मला काहीच घ्यायचं नव्हतं. हे होईपर्यंत दहा वाजले होते. मग जरा पुढं गेल्यावर ‘फुलवारी’ नावाचं एक हॉटेल आतल्या बाजूला दिसलं. एका वाड्यातच मधल्या मोकळ्या जागेचा वापर करून केलेलं ते घरगुती हॉेटेल आम्हाला आवडलं. तिथलं जेवणही चांगलं होतं. महत्त्वाचं म्हणजे आम्हाला स्टीलची ताटं दिली होती, ते आवडलं. जेवून मग बाहेर आलो. तिथं एक रिक्षावाला दिसला. त्याला आमच्या हॉटेलला यायला तयार केलं. थोड्या वेळात हॉटेलला पोचलो. भरपूर दमलो होतो. लगेच झोप आली.

७ एप्रिल २०२६, वाराणसी/पुणे

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्हाला मृत्युंजयेश्वराच्या मंदिरात जायचं होतं. हे आमच्या हॉटेलपासून चालत जाण्याच्या अंतरावर होतं. मग तिकडं गेलो. एवढ्या सकाळीही त्या मंदिरात बरीच गर्दी होती. ते मंदिरांचं एक संकुलच होतं. मग तिथल्या सर्व महादेवांचं, तिथल्या त्या पवित्र पाण्याच्या कुंडाचं दर्शन घेऊन परतलो. येताना आम्ही पहिल्या दिवशी जिथं हिंग कचौडी खाल्ली होती, तिथं जाऊन साईलाही ती खाऊ घातली. त्यानं आमच्या हॉटेलसमोरची ती बागही बघितली नव्हती. मग येताना त्या बागेतून हॉटेलला आलो. तोवर आमच्या हॉटेलमधल्या ब्रेकफास्टची वेळ झाली होती. ब्रेकफास्ट भरपेट केला. आम्हाला अकरा वाजता हॉटेल सोडायचं होतं. मग मी ‘ओला’वरून कॅब बुक केली. ती दहा मिनिटांत आली. चेक-आउट केलं. जाताना कॅबवाल्यानं वाराणसी कँटोन्मेंट परिसरातून गाडी नेल्यानं तोही परिसर बघता आला. साधारण ५० मिनिटांत आम्ही विमानतळावर पोचलो, तेव्हा बरोबर ११.३० झाले होते. आमचं फ्लाइट १.४५ वाजता होतं. मग विमानतळावर टाइमपास केला. सिक्युरिटीत आमचं मिरचीचं लोणचं अडकलं. केबिन बॅगेत मिरची कुठल्याच फॉर्ममध्ये चालत नाही, हे ज्ञान प्राप्त झालं. (चेक-इन बॅगेत चाललं असतं म्हणे. असो.) नाइलाजानं ती बाटली तिथंच सोडली. आमचं गेट पहिल्या मजल्यावर होतं. तिथं एक सुंदर वॉल डिझाइन होतं. मी व साईनं तिथं फोटो काढून घेतले. आमचं गेट आधी ४ नंबरचं होतं. मग ते ६ नंबरला गेलं. मग आमची पालं उठून तिकडं जाऊन बसली. विमान फक्त पाच मिनिटं लेट होतं. मात्र, बरोबर दोन वाजता आम्ही उड्डाण केलं. पुण्यात पहिल्या झटक्यात परवानगी मिळाली नाही. ‘गो अराउंड’ करायला लागलं. त्यामुळं ‘टच्ड डाउन’ला सव्वाचार वाजले. बाहेर येऊन एअरोमॉलला आलो. कॅब आलीच होती. कॅबवाल्याशी कॅश की डिजिटल पेमेंट यावरून किरकिर झाली आणि आपण पुण्यात येऊन पोचल्याची खात्री पटली. साईच्या घरी आमची गाडी ठेवली होती. स्वत:च्या गाडीत बसलो आणि बरं वाटलं. एसी फुल्ल ऑन करून साडेसहाला सुखरूप घरी येऊन पोचलो. 
वाराणसी व अयोध्या ही भारतातली दोन प्रमुख तीर्थस्थळं बघायची खूप दिवसांपासूनची इच्छा अशी पूर्ण झाली होती. काळभैरवनाथाच्या मंदिरात गळ्यात अचानक पुजाऱ्यानं घातलेला हार, नावेत बसल्यावर गंगेच्या पाण्याला झालेला पहिला स्पर्श, काशी विश्वेश्वराचं आणि अयोध्येत ‘रामलल्ला’चं डोळे भरून झालेलं दर्शन, काशी हिंदू विश्वविद्यालयाची ओझरती का होईना, पण झालेली भेट... अशा काही ठळक आठवणी फेर धरून मन:पटलावर दिसत राहिल्या. प्रत्येक प्रवास तुम्हाला काही तरी देतोच. आपण तिथून आल्यानंतर आधीचे राहत नाही. आपल्या धारणा बदलतात, आपण बदलतो! अधिक उदारमतवादी होतो, अधिक शांत होतो... गोष्टी ‘लेट गो’ करायला शिकतो... गंगा व वाराणसीच्या भेटीनंतर तर मला माझ्यातलं ‘भारतीयत्व’ अधिक फुलून आल्याचं फीलिंग आलं आहे. म्हणजे नक्की काय, ते नाही सांगता येणार... गंगेच्या अखंड वाहत्या दिव्य प्रवाहासारखी ही भावनाही पुढल्या आयुष्यभर मनात प्रवाहित होत राहणार एवढं मात्र नक्की!

(समाप्त)

---

पाँडिचेरी ट्रिपविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...


----

10 Apr 2026

वाराणसी-अयोध्या यात्रा - भाग २

ओम नमो गंगायै...
---------------------


४ एप्रिल २०२६, वाराणसी

त्या पायऱ्या उतरून खाली आलो, तर समोर गंगेचं विशाल पात्र. वास्तविक आत्ता एप्रिल महिना असल्यानं हे पाणी कमी होतं. पात्र निम्मं कोरडं होतं. तरीही जी नदी वाहत होती ती पुष्कळ रुंद व मोठीच होती. त्यातून मोठमोठ्या नौका, यॉट सहज ये-जा करत होत्या. त्या गंगादर्शनानं मन संतुष्ट झालं. ‘राम तेरी गंगा मैली हो गयी पापीयों के पाप धोते धोते...’ हे खरं असलं, तरी गंगेचं पावित्र्य व माहात्म्य अबाधित आहे. श्रद्धाळूंसाठी गंगा ही आपले सर्व अपराध पोटात घेणाऱ्या आईसारखी देवी आहे, यात शंका नाही. आम्ही ज्या घाटावर पोचलो, तो शिंदे (सिंधिया) घाट होता. इथं फारशी गर्दी नव्हती. गर्दी असणारे मणिकर्णिका, दशाश्वमेध वगैरे घाट आमच्या उजव्या बाजूला होते. आमच्याकडं वेळ होता. त्यामुळं आत्ताच गंगेतून सैर करावी, असं ठरलं. अभि व शुभम म्हणाले, की इथल्या नावाड्यांशी आम्ही बोलतो. मग त्यांनी त्यांच्या खास ‘यूपी’ भाषेतून नावाड्याशी सौदा ठरवला आणि आम्ही त्या छोट्याशा होडीत बसलो. आम्ही सहा जण होतो. सगळ्यांनी ती लाइफ जॅकेट्स घातली. सीएनजीवर चालणारी ती होडी लगेच उजव्या बाजूला वेगात जाऊ लागली. आम्ही आमच्या उजव्या हाताला वाराणसीचे ते प्रसिद्ध घाट बघू लागलो. काय बघू आणि अन् काय नाही, असं होऊन गेलं. इतके दिवस केवळ माहितीपटांत, सिनेमांत बघितलेले ते भव्य घाट, तिथली जुनी मंदिरं, त्यांचे कळस, सर्वत्र फडफडणारे भगवे झेंडे, किनाऱ्यावर उभ्या असलेल्या रंगबिरंगी होड्या, घाटांवर लगबगीने धावणारे पुजारी किंवा पंडे, त्यांच्या मागोमाग धावपळ करणारे भाविक, अधूनमधून ऐकू येणारा घंटानाद, दक्षिण भारतीय भाषांपासून ते थेट जपानी, चिनी वा कोरियन भाषांत रंगवलेले फलक, अतिशय मजबूत बांधकाम असणारे व किल्ल्यासारखे भासणारे दरभंगा घाटासारखे अचाट घाट, मणिकर्णिका व हरिश्चंद्र घाटावर सतत जळणारी प्रेतं, त्या आगीच्या लोळांतून डोळ्यांत घुसणारे ‘मृत्यू हेच शाश्वत सत्य’ यासारखे विचार, काशीला गंगेकाठी मरण म्हणजे थेट मोक्ष मानणारी व जुन्या काळी इथं येऊन खरोखरच मृत्यूला कवटाळणारी किती तरी भोळीभाबडी माणसं... सिनेमातली दृश्यं सरकावीत, तशी पुढं जाणाऱ्या होडीबरोबर उजव्या बाजूला ही सगळी दृश्यं काही प्रत्यक्ष, तर काही मन:पटलावर तरळून जात होती. आम्ही गंगेत हात बुडवत होतो, ते पाणी हाताला, डोक्याला, डोळ्यांना लावत होतो. त्या थंडगार पाण्याच्या स्पर्शातून आपली सगळी आदिम संस्कृतीच कडकडून भेटायला आली आहे, असं काहीसं वाटून गेलं.
गंगेकाठी एकूण १०४ घाट आहेत. आम्ही त्यातले ५०-६० तरी पाहिले असावेत. अर्थातच नदीतून, धावते असे. बरंच पुढं जाऊन होडीनं यू-टर्न घेतला. दुपारची वेळ असली, तरी सुदैवानं ढगाळ वातावरण होतं. अनेक मोठमोठ्या नौकांतून बरेच भाविक, पर्यटक गंगाविहार करत होते. एखादी होडी जवळून गेली, की ‘हर हर महादेव’, ‘जय भोलेबाबा की’ अशासारखे गजर उठत होते. प्रत्येकाचा चेहरा गंगास्पर्शानं झालेल्या आनंदानं उजळून निघाला होता. आमच्या मित्रांनी नावाड्याला आम्हाला ‘गायघाट’ इथं सोडायला सांगितलं होतं. आम्ही जिथून होडीत बसलो, तिथून पुढं डावीकडं हा घाट होता. त्यामुळं आम्हाला बरीच मोठी चक्कर मिळाली. अखेर आम्ही गायघाट इथं उतरलो. मन आनंदानं भरून गेलं होतं. अनेक वर्षं जी कामना केली होती, ती आज देवाच्या कृपेनं फळाला आली होती. गंगेत घोडं न्हालं एकदाचं!


आता असं ठरलं, की हॉटेलवर जाऊन थोडी विश्रांती घेऊ या आणि दुपारी तीननंतर पुन्हा फिरायला बाहेर पडू या. आम्ही हॉटेलकडं चालत जाताना एके ठिकाणी लस्सी दिसली. आम्हाला भूक लागलीच होती. मग ती मोठा वाडगाभर लस्सी सगळे प्यायलो. अप्रतिम अशी ती लस्सी प्यायल्यावर आमची भूक पूर्ण गेली. आता हेच जेवण असं सगळ्यांनाच वाटून गेलं. तिथून रिक्षा करून हॉटेलवर गेलो. तासभर आराम केला. दुपारी साडेतीन वाजता पुन्हा आमचे मित्र हॉटेलवर आले, मी त्यांना आधीच सांगितलं होतं, की मला बनारस हिंदू विश्वविद्यालय (बीएचयू) बघण्यात अधिक रस आहे. शिवाय तिथंही काशी-विश्वेश्वराचं आणखी एक मंदिर आहे, हे माहिती होतं. तेही बघता आलं असतं. ते बघून पुन्हा गायघाटावर येऊन, गंगेची आरती बघायची असं ठरलं. मग आम्ही सरळ एक कॅब बुक केली. ‘बीएचयू’चं अंतर बरंच, म्हणजे दहा किलोमीटरहून जरा अधिक दाखवत होतं. आम्हाला वाटलं होतं, की आम्ही पाऊण तासात पोचू. मात्र, वाराणसीच्या भयंकर ट्रॅफिकमुळं आम्हाला जवळपास एक ते सव्वा तास लागला. आम्ही तिथं पोचलो, तोवर पाच वाजून गेले होते. जाताना रस्त्यानं रोप-वेचं काम चालू असलेलं दिसलं. इथल्या रेल्वे स्टेशनपासून ते काशी-विश्वनाथ मंदिरापर्यंत हा रोप-वे तयार करण्यात येत आहे. त्यामुळं शहरातल्या वाहतुकीवरचा ताण जरा हलका होईल. आम्ही ‘बीएचयू’च्या प्रवेशद्वारावर पोचलो, तेव्हा दारातच पं. मदनमोहन मालवीय (या विद्यापीठाचे संस्थापक व थोर विद्वान) यांचा पूर्णाकृती पुतळा दिसला. समोर तपकिरी व पिवळसर रंगसंगतीची विद्यापीठाची स्वागत कमान दिसली. त्यावरची ‘काशी हिन्दू विश्वविद्यालय’ हे शब्द व त्याचं लेटरिंग मला फार आवडलं. मला चंद्रमोहन कुलकर्णी यांची आठवण झाली. त्यांनी अशा वैशिष्ट्यपूर्ण लेटरिंगवर, वळणदार अक्षरांवर ‘मटा संवाद’मध्ये एक सदरच लिहिलं होतं, ते आठवणं स्वाभाविक होतं. थोड्या वेळानं आमची कॅब त्या मंदिरासमोर थांबली. इथंही पर्यटकांची भरपूर चहलपहल होती. अर्थात हे मंदिर आधुनिक होतं आणि तुलनेनं गर्दी सुसह्य होती.
आम्ही आत जाऊन शांतपणे ते मंदिर बघितलं. इथं मोबाइल न्यायला परवानगी होती. त्यामुळं भरपूर फोटो काढले. इथल्या महाविद्यालयांच्या इमारतीही देवळाच्या कळसासारख्या आकाराच्या बांधल्या आहेत. हे विद्यापीठ बघण्याचं आणखी एक कारण म्हणजे प्रा. जयंत नारळीकर. नारळीकरांचे वडील रँग्लर विष्णू नारळीकर या विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते. त्यामुळं नारळीकरांचं शालेय जीवन याच विद्यापीठीत व्यतीत झालं. ‘मला लहानपणी मराठीपेक्षा हिंदी चांगली बोलता यायची,’ असं त्यांनी ‘चार नगरांतले माझे विश्व’ या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकात लिहिलं आहे. या चार नगरांतलं एक नगर अर्थातच बनारस होतं. नारळीकरांनी त्या दिवसांचं मोठं मनोज्ञ वर्णन या पुस्तकात केलं आहे. तेव्हापासून मला हे विद्यापीठ पाहायचं होतं. अर्थात ही फारच धावती भेट होती व विद्यापीठाच्या आवारात केवळ मी जाऊन आलो. पण ‘दुधाची तहान ताकावर’ याप्रमाणे मी मनाचं समाधान करून घेतलं.
आता आम्हाला भूक लागली होती. मंदिराच्या बाहेर खाण्याचे स्टॉल होते. तिथं वडापावही मिळत होता. मग आम्ही सगळ्यांनीच तोच घेऊन खाल्ला आणि मग अर्थातच ‘कुल्हड’वाला चहा घेतला. त्यामुळं जरा तरतरी आली. मग पुन्हा कॅब करून ‘गायघाट’ला निघालो. येताना लागलं त्याहून दुप्पट ट्रॅफिक जाताना लागलं. त्यामुळं साडेसातची आरती मिळते की नाही, असं वाटून गेलं. आम्हाला त्या घाटावर पोचायला बराच उशीर झाला. जवळपास सव्वाआठ वाजत आले होते. आम्ही मगाशी इथं येऊन गेलो होतो, त्यामुळे रस्ता माहीत होता. आम्ही पळतच घाटावर निघालो. आमचे मित्र त्यांच्या दुचाकीवरून कधीच घाटावर येऊन बसले होते. आम्ही पायऱ्या उतरत असतानाच मंत्रपुष्पांजली ऐकू आली. मला वाटलं, संपली आरती. आता काही बघायला मिळत नाही. मात्र, आम्ही पोचलो तेव्हा आणखीही मंत्र, आरत्या सुरू झाल्या. त्यामुळं आम्हाला निदान तो भाग तरी बघायला मिळाला. या घाटावर तुलनेनं गर्दी कमी असते. मात्र, नदीतून नौकेत बसून समोरून आरती बघण्याची आमची संधी हुकली. आरती झाल्यावरही आम्ही तिथं जरा रेंगाळलो. तिथं अनेक जण ते दिवे सोडत होते. साई व वृषालीनं आधी तिथून तो एक दिवा विकत घेऊन नदीत सोडला. मग आम्हीही सोडला. गंगेवरून येणाऱ्या वाऱ्यामुळं तिथं बसायला छान वाटत होतं खरं... पण आता आम्हाला भूक पण लागली होती आणि बाजारपेठेत जरा चक्करही मारायची होती. मग तिथून चालत निघालो सगळे. आमच्या मित्रांना आम्हाला प्रसिद्ध काशी चाट भांडारमध्ये न्यायचं होतं. पण तिथं जाईपर्यंत बराच उशीर झाला. मग खरेदीचा मोह टाळून थेट तिकडंच गेलो. जाताना पायाचे तुकडे पडले. काशी-विश्वेश्वराच्या त्या रस्त्यावर फक्त त्या गोल्फ कार्टसारख्या संस्थानच्या गाड्या चालतात. रिक्षांना रात्री १२ नंतरच तिकडून जायला परवानगी आहे. तिथला तो प्रसिद्ध चौक ‘रोप-वे’चं काम सुरू असल्यानं आणखी अरुंद झाला होता.

त्या चाट भांडारच्या दुकानासमोर ही गर्दी होती. आम्हाला वाटलं, की बहुतेक परत जावं लागणार. मात्र, थोड्या वेळात आम्हाला चक्क आत बसायला जागा मिळाली. मग तिथं बसून भरपेट पोटपूजा केली. टमाटर चाट ही तिथली स्पेशालिटी. त्यानंतर आलू टिक्की, फालुदा असं एकेक मागवून हाणलं. भरपूर झालं. आता आम्हाला खरेदीचाही उत्साह नव्हता आणि चालायचाही. मग आमच्या या मित्रांनी चक्क जुगाड करून दोन दुचाकीवाल्यांना पटवलं. ते खरोखर रायडर होते की असेच होते, कुणास ठाऊक. पण त्यांनी आम्हाला चक्क ट्रिपल सीट नेऊन हॉटेलला सोडलं. शंभर रुपयांत फक्त. आम्ही एवढे दमलो होतो, की कसंही करून हॉटेलला पोचायचं होतं. सहज बघितलं तर दिवसभरात आम्ही १५ हजारहून अधिक पावलं चाललो होतो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला अयोध्येला जायचं होतं. त्यामुळं आमच्या मित्रांचे आभार मानून, आम्ही त्यांना निरोप दिला आणि रूमवर जाऊन ढाराढूर झोपलो.

रामजन्मभूमीकडे....

५ एप्रिल २०२६, वाराणसी/अयोध्या

सकाळी लवकर उठून आवरलं. ब्रेकफास्ट करून चेकआउट केलं. हॉटेलवाल्याला स्टेशनला सोडायला रिक्षा मागवायला सांगितल्या. इथल्या मुख्य रेल्वे स्टेशनला वाराणसी कँटोन्मेंट असं नाव आहे. आमच्या तिकिटावर लिहिलं होतं, की ‘वंदे भारत’ला फक्त वाराणसी जंक्शन इथूनच बसता येईल. आमच्या मित्रांनी आम्हाला कालच सांगितलं होतं, की इथं त्या स्टेशनला ‘कैंट’ म्हणतात, तर तुम्ही तसंच सांगा. वाराणसी सिटी नावाचंही एक मोठं स्टेशन आहे. आता नवोदित माणसाचा नक्कीच गोंधळ होईल, अशीच ही माहिती होती. अखेर आम्ही स्टेशनची खात्री करून रिक्षात बसलो. दोन्ही रिक्षांनी आम्हाला वीस मिनिटांत स्टेशनवर सोडलं. हे स्टेशन भव्य होतं. आमची ट्रेन सात नंबरच्या फलाटावर लागली होती. मग आम्ही सामान घेऊन ब्रिजवरून तिकडं गेलो. ही गाडी इथूनच सुटत असल्यानं ती फलाटावर उभीच होती. इथून ती मेरठला जाते. साधारण ८०० किलोमीटरच्या अंतरात मध्ये फक्त पाच की सहा स्टेशनं घेते. इथून निघाली, की अडीच तासांनी पहिला स्टॉप अयोध्या धाम हाच होता. गाडी वेळेत निघाली. साधारण ११० किलोमीटर ताशी हा सर्वोच्च वेग तिनं काही वेळा गाठला. मला उत्तर प्रदेशचा बराच मोठा भाग या प्रवासात बघायला मिळाला. सगळा सपाट मैदानी प्रदेश. अनेक ठिकाणी धान्य काढून त्याच्या पेंड्या रचून ठेवल्या होत्या. सगळीकडं कडक उन्हामुळं एक पिवळट-मातकट रंग पसरला होता. ‘वंदे भारत’मध्ये आम्ही एसीत बसलो होतो. बाहेर मात्र रणरणतं ऊन होतं. छोटी छोटी गावं लागली. बाहेर एवढ्या उन्हातही क्रिकेट खेळणारी मुलं... एखाद्या मोठ्या झाडाला पार, त्यावर बसलेले वृद्ध... सगळी घरं विटांची आणि बाहेरून प्लास्टर न करण्याची पद्धत, त्यामुळं त्या विटा अशा उघड्या दिसणाऱ्या... अशीच सगळी एक मजली किंवा जास्तीत जास्त दुमजली घरं. दोन्ही बाजूंनी असाच अफाट व सपाट पसरलेला हा उत्तर प्रदेश! हिंदी हार्टलँड... अनेकदा ‘गायपट्टा’ म्हणून हिणवला जाणारा. मात्र, अगदी पूर्वी ‘स्टार प्लस’वरच्या ‘क्यूं की साँस भी कभी बहू थी’ या आणि अशा अनेक हिंदी मालिकांचा लाखोंच्या संख्येत असलेला ‘कोअर’ प्रेक्षक असलेली ही भूमी. आमच्या प्रवासात जौनपूर हे एकच मोठं शहर लागलं. बाकी छोटी गावं. बऱ्याच गावांची नाव जफराबाद वगैरे मुस्लिम वळणाची. अयोध्येपर्यंतचं १९० किलोमीटरचं अंतर आमच्या ‘वंदे भारत’नं अडीच तासांत कापलं. सकाळी ९.१० ला निघालेली गाडी बरोबर ११.४० वाजता ‘अयोध्या धाम’ असं नव्यानं नामकरण झालेल्या (माझ्या माहितीनुसार आधी या स्टेशनचं नाव फैजाबाद होतं...) त्या भव्य स्थानकात पोचली. गाडीला ठरलेल्या वेळेपेक्षा फक्त सहा मिनिटं उशीर झाला होता.

इथं स्टेशनची रचना वैशिष्ट्यपूर्ण होती. स्टेशनच्या दोन्ही फलाटांना धरून वरच्या बाजूला पहिल्या मजल्यावर मोठं प्रतीक्षालय व त्यावर मोठा डोम असं बांधलं होतं. आम्ही सरकत्या जिन्यानं वर गेलो. ते भव्य प्रतीक्षालय ओलांडून पलीकडच्या बाजूनं सरकत्या जिन्यानं खाली उतरलो व स्टेशनबाहेर आलो. वृषालीनं कॅब बुक केली होती. सात नंबरच्या गेटपाशी या असं त्यानं सांगितलं. तिकडं गेलो, तर तिथं बऱ्याच कॅब उभ्या होत्या. सुदैवानं आमची कॅब लगेच सापडली. इथून आम्ही बुक केलेलं ‘हॉटेल पंचशील’ सहा किलोमीटरवर होतं.
अयोध्या शहराच्या दिशेनं गाडी निघाली. भगभगत्या उन्हात ते मध्यम आकाराचं गाव अगदीच साधं वाटलं. पूर्वी तर फैजाबाद व अयोध्या ही दोन्ही गावं फारच बकाल होती, असं अनेकांकडून ऐकलं होतं. आता मात्र रस्ते एकदम चांगले दिसले. आमचं हॉटेल हायवेच्या बाजूलाच होतं. तिथं पोचलो तेव्हा फक्त सव्वाबारा वाजले होते. आमचं ‘चेक-इन’ एक वाजता होतं. मात्र, तिथल्या लोकांनी औपचारिकता पूर्ण करून आम्हाला लगेचच खोल्या ताब्यात दिल्या. आम्हाला भूक लागली होती. या हॉटेलच्या प्रांगणात त्यांचंच एक चांगलं गार्डन रेस्टॉरंट होतं. मग तिथं गेलो. हॉटेलमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. अगदी पुण्यात आल्यासारखं वाटलं. जेवण ठीकठाक होतं. पुन्हा अयोध्येत आल्यासारखं वाटलं. नंतर बिल आल्यावर पुन्हा पुण्यात आल्यासारखं वाटलं. असा लंचचा सी-सॉ खेळून झाल्यावर आम्ही तिथूनच बाहेर पडलो. आता श्रीरामजन्मभूमी तीर्थाकडं जाऊन ‘रामलल्ला विराजमान’चं दर्शन घेण्याची अतिशय उत्सुकता होती. आम्ही बाहेर येऊन कॅब बुक करायला लागलो. मात्र, दुपारी दोनच्या त्या रणरणत्या उन्हात एकही कॅबवाला येईना. मग पुन्हा हॉटेलमध्ये येऊन तिथल्या ‘ट्रॅव्हल डेस्क’वर आमच्यासाठी कॅब बुक करायची विनंती केली. त्याने एक हजार रुपये होतील, असं सांगितल्यावर ‘धन्यवाद’ म्हणून पुन्हा बाहेर आलो. आमच्या हॉटेलपासून रामजन्मभूमी तीर्थ सहा-साडेसहा किलोमीटर होतं. त्यामुळं जास्तीत जास्त दोनशे ते अडीचशे रुपये व्हायला हवे होते. अखेर एक कॅब बुक झाली. तो कॅबवाला चांगला होता. जाताना बरीच माहिती त्यानं दिली. अयोध्येचं बदललेलं रूप जाणवत होतं. उत्तम, रुंद रस्ते, आकर्षक पथदिवे, चित्रांनी सजलेल्या भिंती असं सगळं नवं कोरं होतं. थोड्याच वेळात आम्ही टेढी बाजार नावाच्या चौकात येऊन पोचलो. इथून पुढं कॅब वा रिक्षा जात नाही. इथून पुढं संस्थानच्या गोल्फ कार्टसारख्या गाड्याच आत जातात. तिथून रामजन्मभूमी तीर्थाच्या प्रवेशद्वारापर्यंत २० रुपये तिकीट होतं. आम्ही त्या कार्टमध्ये बसून पाच मिनिटांत त्या प्रवेशद्वारापाशी पोचलो. जाताना दोन्ही बाजूंनी विविध दुकानं आणि भाविकांची वाढती गर्दी दिसू लागली. त्या ट्रस्टच्या भव्य कार्यालयाच्या दारात आम्ही उतरलो. ‘जगद्गुरू श्रीरामानन्दाचार्य द्वार’ असं लिहिलेल्या प्रवेशद्वारातून आत गेलो. आम्ही कुठलंही ऑनलाइन बुकिंग केलं नव्हतं. ‘थेट जा, काही प्रॉब्लेम नाही,’ असं बऱ्याच जणांनी सांगितलं होतं. तरी त्या ट्रस्टच्या कार्यालयात ‘स्वागत कक्षा’त जाऊन मी चौकशी करून आलो. तिथं फक्त व्हीलचेअर हवी असेल तर नाव नोंदवायची व्यवस्था आहे. बाकी लॉकर, चपला ठेवायची जागी वगैरे सर्व पुढं आहे, असं सांगण्यात आलं. मग आम्ही बाहेर येऊन रांगेला लागलो. इथं रांगेवर छत बांधलेलं असल्यानं उन्हाचा त्रास नव्हता. स्टीलचे बार उभे करून रांगा केल्या होत्या. त्यामुळं रांग अस्ताव्यस्त होत नव्हती. ही सर्व व्यवस्था अतिशय समाधानकारक होती. रांगेत थोडं पुढं गेल्यावर समोरच राम मंदिराच्या मुख्य कळसाचं व धर्मध्वजाचं दर्शन झालं आणि मन प्रसन्न झालं. उन्हाचा सगळा ताप गेला. ‘अनुदिनी अनुतापें तापलो रामराया’ ही भावना एकदम नष्ट झाली. अंगात वेगळाच उत्साह संचारला. तिथून साधारण ७०० मीटर अंतरावर आत डाव्या बाजूला बूट-चपला ठेवायची जागा होती. तिथं एका पिशवीत आपापल्या चपला वा बूट ठेवून कुपन घ्यायचं होतं. उन्हामुळं पाय पोळू नयेत म्हणून तिथं कार्पेट टाकण्यात आले होते. त्यामुळं पाय भाजत नव्हते. तिथून मग समोरच्या मोठ्या इमारतीत असलेल्या लॉकरच्या रांगेत उभे राहिलो. इथंही काय आता नेता येतं व काय नेता येत नाही याच्या स्पष्ट सूचना देणारे फलक व्यवस्थित लावले होते. त्यानुसार मोबाइल, स्मार्ट वॉच, कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण आत नेता येत नाही. याउलट पैसे, वॉलेट, छोटी पर्स, पारंपरिक घड्याळ, बेल्ट हे सगळं चालत होतं. या इथे मात्र बरीच मोठी रांग होती. सिंगल लाइन करताना आम्हाला बरीच यातायात करावी लागली. लोक ऐकत नव्हते. बेशिस्तीचं दर्शन घडत होतं. अज्ञानामुळं काहींचा वेळ जात होता. मात्र, ही तपश्चर्या पार पाडून आम्ही एकदाचे त्या मुख्य संकुलाकडं निघालो. आता ‘रामलल्ला’चं दर्शन काही मिनिटांतच होणार होतं... ज्यासाठी हा सगळा अट्टाहास केला तो क्षण असा जवळ येऊन ठेपला होता... १९९२ पासूनच्या सगळ्या घटना डोळ्यांसमोरून तरळून गेल्या. त्रेतायुगात १४ वर्षं वनवास सोसाव्या लागलेल्या श्रीरामाला कलियुगात मात्र पाचशे वर्षांचा वनवास सोसावा लागला होता... तो वनवास २२ जानेवारी २०२४ रोजी संपला होता. त्या दिवसापासून इथं येण्याची आस मनात बाळगली होती. त्या स्वप्नपूर्तीचा क्षण जवळ येत चालला होता... डोळे रामाच्या त्या बालकरूपाचं दर्शन घ्यायला आतुर झाले होते...

(क्रमश:)

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-----



-----------