28 Mar 2024

अक्षरधारा दिवाळी अंक २३ लेख - भाग २

‘हास्यजत्रा’ हेच जगणं...
---------------------------------------------------------

- सांगतोय समीर चौघुले


रसिकहो, नमस्कार! अक्षरधाराच्या दिवाळी उपक्रमात आपलं स्वागत आहे. आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेछा! यंदाच्या अंकामध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा या सोनी मराठीवरच्या धमाल, विनोदी आणि लोकप्रिय अशा कार्यक्रमाच्या काही कलाकारांबरोबर आज आपण गप्पा मारणार आहोत. आणि या कार्यक्रमातील सर्वांत महत्त्वाचा अभिनेता आणि लोकप्रिय स्किटस्टार समीर चौघुले यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. 

श्रीपाद ब्रह्मे : समीर नमस्कार!

समीर चौघुले : नमस्कार!

श्रीपाद ब्रह्मे : खरं तर तुला समीरदादा म्हणायला हवं! हे विशेषण त्याला सर्वच बाबतीत लागू आहे असं मी म्हणेन. कारण तो लेखक आहे, अभिनेता आहे आणि त्याने ‘हास्यजत्रे’चा शो एकहाती पेलतोय. अर्थात हे टीमवर्क आहे हे तो सांगेलच. कलाकार आहे, दिग्दर्शक आहे पण… हा पणही महत्त्वाचा आहे कारण या पण नंतरही समीर चौघुले बरेच उरतात. तर समीर खूप खूप स्वागत आहे आणि दिवाळीच्या शुभेछा देतो. 

समीर चौघुले : खूप खूप शुभेछा!

श्रीपाद ब्रह्मे : हास्यजत्रा ही नशा आहे, असं मी म्हणतो. प्रेक्षकांना ही नशा आहे तर ती सादर करणाऱ्याला किती असेल! काय आहे ही नशा?

समीर चौघुले : तुमच्यासाठी नशा असेल, आमच्यासाठी जगणं आहे ते! दिवसरात्र ‘हास्यजत्रा’ आमच्या डोक्यात असते. एखादा कार्यक्रम तुमच्या आयुष्यात असा येतो, की तुमच्या आयुष्याला खूप मोठी कलाटणी मिळून जाते. हा तो कार्यक्रम आहे. ज्याला प्रेक्षकांचा आश्रयसुद्धा मिळाला, फार मोठमोठ्या कलाकारांनी वाहवा पण केली. असा एखादाच कार्यक्रम असतो, की जो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतो. आत्ता आम्ही अमेरिकेचा दौरा केला, इतर ठिकाणी दौरे केलेत तिथे आम्ही विस्मयचकित होतो, की हा एवढा कार्यक्रम कसा पोहोचू शकतो! तर त्यामुळेच ‘हास्यजत्रा’ आमचं जगणं आहे. खाताना, झोपतानासुद्धा आमचा दुसरा मेंदू सतत ‘हास्यजत्रे’चाच विचार करत असतो. तुम्ही जे मघाशी म्हणालात की मी एकहाती सगळं पेलतो, तसं खरंच नाहीय. कुठलाही कार्यक्रम एक माणूस तारून नाही नेऊ शकत. ते टीमवर्कच असतं. मी मनाचा मोठेपणा दाखवून बोलतोय असं काही नाहीये, कारण दॅट्स अ फॅक्ट! कारण ‘हास्यजत्रे’चे सातशे एपिसोड ही खूप कठीण गोष्ट आहे आणि जी मी रोज अनुभवतो. म्हणजे एक परफॉर्मन्स झाल्यावर, सई-प्रसादने कौतुक केल्यावर तो विषय तिथेच संपतो. आम्ही त्या सोफ्यावर जाऊन बसतो आणि पुढचा विचार येतो. प्रसाद खांडेकर म्हणतो, ‘अरे, उद्या काय करायचं? उद्या पाटी कोरी आहे आपली.’ कारण दर वेळेला तुम्हाला एक पायरी चढायचीच असते. ‘हास्यजत्रा’ लोकांना एवढं आवडतंय, त्याचं एवढं नाव झालंय, की एक पायरी खाली नाही येऊ शकत तुम्ही. निदान तुम्हाला त्या पायरीवरच राहावं लागतं किंवा एक पायरी वर जायला लागतं. या ज्या अपेक्षा असतात ना त्याचं खूप मोठं प्रेशर असतं. आम्ही खूप जबाबदार झालो आहोत त्यामुळे. ‘हास्यजत्रे’ने लोकांची आयुष्यं बदललीयेत. जेव्हा तुम्ही खरंच लोकांची आयुष्यं बदलता, तेव्हा जबाबदारीही वाढते. अनेक लोकांच्या आयुष्यात खूप नैराश्य आलेलं असतं, तेव्हा ते लोक ‘हास्यजत्रे’कडे एक उपाय म्हणून बघतात. अनेक कॅन्सर पेशंट, आत्महत्येचा विचार करणाऱ्या अनेक लोकांना ‘हास्यजत्रे’ने थांबावलेलं आहे. तशी पत्रं आलेली आहेत आमच्याकडे! अशी पत्रं जेव्हा आमच्यापर्यंत पोहोचतात तेव्हा आम्ही कलाकार, आमची कोअर टीम हाच विचार करत असते, की हे सोपं नाहीये. यासाठी खूप जास्त मेहनत केली पाहिजे. काल आम्हाला इथे  शब्दश: रात्रीचे दीड-दोन वाजले. सकाळी पाच वाजता उठलो. दोन तास झोपलो. जे स्क्रिप्ट मला थोडं कच्चं वाटत होतं ते लिहिलं. आणि आज ते उत्तम झालं. त्यामुळे मी रिलॅक्स झालो. हा आनंद मी तुम्हाला नाही सांगू शकत, की तो काय असेल! तर ही अशी ती गंमत आहे. 

श्रीपाद ब्रह्मे : ‘हास्यजत्रा’ बाकी सर्व विनोदी कार्यक्रमांपेक्षा वेगळी कशी ठरते? 

समीर चौघुले : आम्ही सर्व जण आधी ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ नावाचा कार्यक्रम करायचो. सत्तर टक्के हीच टीम होती. आम्ही हेच काम करायचो. पण त्याचे चारशे-साडेचारशे एपिसोड झाल्यावर, आपण एखादी गोष्ट रोज केल्यानंतर, काय केल्यानंतर ते इफेक्टिव्ह होईल, लोकांना काय आवडेल याचे ठोकताळे आम्हाला कळायला लागले. त्यानंतर मध्ये एक-दोन वर्षांची गॅप गेली आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आली. तेव्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ करताना याआधी आम्ही केलेल्या सर्वं चुकांचं आम्ही त्रैराशिक मांडलं. आमच्या लक्षात आलं, की जर आपण लोकांना सीट-कॉम (सिच्युएशनल कॉमेडी) दिलं, जिथे कोणा एकाला हीरो न करता सिच्युएशन हाच हिरो असेल, स्किट हिरो असेल! आणि ते आमच्या डोक्यातून बिलकुल खाली पडू देत नाही आम्ही. आणि म्हणूनच स्किटचे विषय लोकांना खूप आपलेसे वाटतात. ठेच लागत लागतच आम्ही सगळं शिकत गेलो. वाईटातून चांगलं होणं असं जे म्हणतात ते आमच्या बाबतीत करोनामुळे झालं. करोनात आजूबाजूला इतकं नैराश्य होतं, त्या काळात ‘हास्यजत्रे’ने लोकांसाठी नवसंजीवनीसारखं काम केलं आहे. जेवढी लोकप्रियता करोनाकाळात ‘हास्यजत्रे’ला मिळाली तेवढी आधी नव्हती. अनेक ठिकाणी ‘लाफ्टर थेरपी’ म्हणून हास्यजत्रेची स्किट्स दाखवली आहेत. संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ दरम्यान अनेक कोव्हिड सेंटरमध्ये स्क्रीन्स ‘सोनी मराठी’ने पुरवली आहेत. ‘सोनी मराठी’ने खूप मोठं काम केलंय या काळात. प्लाझ्मा आणि एलसीडी पुरवल्यात अनेक कोव्हिड सेंटरमध्ये. माणसं हसली की ती लवकर बरी होतात, हा वैज्ञानिक नियम आहे. हे कार्य नकळतपणे घडत गेलं, मुद्दाम ठरवून नव्हतं केलेलं! प्रामाणिकपणे या सर्व गोष्टी आम्ही आमच्या परीने करत गेलो. पहिल्या महायुद्धानंतरही असंच झालं होतं. त्या काळात प्रचंड गरिबी होती, दु:ख होतं. अशा परिस्थितीत चार्ली चॅप्लिनने जगाला हसवलं. तो फाटका होता म्हणून तो आपलासा वाटला. तो श्रीमंत, राजबिंडा असता तर तो आपल्यातला वाटला नसता. विशाखा आणि मी जे ऑफिसचं स्किट करायचो, तेव्हा अनेक एम्प्लॉईजना मनात असतं, की आपल्या बॉसला उत्तर द्यायचं; पण त्या हुद्द्यामुळे उत्तर देऊ शकत नव्हतो, पण त्याला मी एक वाट करून दिली. त्यामुळे लोकांना ते विषय आपलेसे वाटतात. लोकांनी जे सहसा अनुभवलेलं असतं तेच त्यांना जास्त रिलेट होतं आणि हाच फॉर्म्युला आम्ही तिकडे ‘हास्यजत्रे’त वापरतो. मी एक स्किट केलं होतं, त्यात एक लग्नाची पंगत असते. त्यात मला खायला काही मिळतच नाही शेवटपर्यंत. हे असं प्रत्येकाच्या बाबतीत झालेलं आहे. माझ्या मते हीच खासियत आहे ‘हास्यजत्रे’ची! हा एकमेव कार्यक्रम असा आहे, की दोन-तीन पिढ्या एकत्र मिळून हा कार्यक्रम बघतात. हे फार मोठं काम आहे आजच्या घडीला असं मला वाटतं. आम्ही जेव्हा अमेरिकेत गेलो होतो, तेव्हा एक बाईने मला सांगितलं, की तिच्या मुलाने जो इंग्लिश माध्यमात शिकतो, त्याने तिला विचारलं की, 'ममा व्हॉट डू यू मीन बाय संभ्रमात?' माझ्या डोळ्यात पाणीच आलं त्यामुळे.’ हास्यजत्रेमुळे मुलं मराठी बघू लागली जी मुलं आधी फक्त इंग्लिश सीरीजच बघायची, ती मुलं आता त्यांना अडलेल्या मराठी शब्दांचे अर्थ त्यांच्या पालकांना विचारू लागली. आणि हे सगळं नकळतपणे ‘हास्यजत्रे’मुळे होतंय याचा आम्हाला आनंद आहे. लोकांच्या अपेक्षा वाढत गेल्या म्हणून आम्ही तेवढे जबाबदार झालो आहोत. या सर्व गोष्टींमागे प्रेक्षक आहेत.

श्रीपाद ब्रह्मे : ‘हास्यजत्रा’मधला विनोद निखळ आहे किंवा निर्विष आहे, असं म्हणू या. हा विनोदाचा दर्जा तुम्ही कसा टिकवता?

समीर चौघुले : याबाबत मला सर्वांत जास्त आभार मानायचे आहेत अजय (भाळवणकर) सरांचे. त्यांचं सुरुवातीपासूनच म्हणणं होतं, की हा शो आपल्याला कुटुंबासाठी करायचाय. स्किट सर्व कुटुंबाला एकत्र बघता आले पाहिजेत. त्यात कोणाला ऑकवर्ड नाही वाटलं पाहिजे. कमरेखालचे विनोद करणं किंवा द्व्यअर्थी विनोद करणं खूप सोपं असतं. निर्विष आणि निखळ विनोद करणं कठीण असतं. ते आव्हानात्मक आहे, त्यामुळे ते करण्यात जास्त मजा आहे. तुम्ही मग आखून दिलेल्या वर्तुळाच्या बाहेर निघायचा सतत प्रयत्न करत राहता आणि त्या प्रयत्नांमधून चांगल्या गोष्टी घडतात. आमच्या टीमचा सतत तोच प्रयत्न असतो. काल जे झालं ते आज नाही करायचं. आज जे झालं आहे ते उद्या नाही करायचं, असं डोक्यात सतत चालू असतं. आमची जी दोन विद्यापीठं आहेत - गोस्वामी सर आणि मोटे सर - त्यांचा वचक असतो. काय करायचं नाही हे प्रकर्षाने सांगितलं जातं. ‘सहकुटुंब हसू या’ - ही जी आमची टॅगलाइन आहे - तसाच प्रयत्न आमचा चालू असतो. 

श्रीपाद ब्रह्मे : स्किट करताना कोण जास्त वरचढ असतं? तुझ्यातला लेखक की तुझ्यातला अभिनेता?

समीर चौघुले : आता जिथे लेखक कमी पडतो तिथे माझ्यातला अभिनेता धावून जातो मदतीला. नाही तर या दोन्ही गोष्टी पूरक असतात. लेखक म्हणून कधी कधी सुचत नाही ते अभिनेता म्हणून ‘ऑन द स्पॉट’ सुचतं. मी अभिनेता बाय प्रोफेशन आहे आणि लेखक बाय चॉइस आहे. मराठी लेखनात पैसा नाहीय; मात्र समाधान खूप आहे. पैसा नाही याची खंत आहेच. मी जे लिहीन त्याचा आनंद मला मिळाला पाहिजे. सुचणं हा प्रकार मला मी लेखक झाल्यापासून झाला. त्याच्यामागे अनेक वर्षं मी काम करतोय. २९ वर्षं मी काम करतोय. पाच हजार प्रयोग केलेत नाटकांचे. नाटकांच्या प्रयोगांनी मला खूप घडवलं. ‘यदाकदाचित’ नावाचं नाटक होतं त्याचे मी जवळजवळ तीन हजार प्रयोग केले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केले आहेत. कधी कधी माइक बंद असतात. मध्येच एका माइकचा स्फोट झाला, साप आला, बैल घुसले… हे सगळं मी अनुभवलेलं आहे. तर त्यातून मी खूप तावून-सुलाखून निघालो. मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला, की नाटक पहिल्यांदा माझ्या आयुष्यात आलं. मी नेहमी हे सांगत असतो, की नाटक तुम्हाला अलर्ट ठेवतं. नाटक हे ना एखाद्या नागमोडी वळणासारखं असतं. पुढे काय होईल हे त्या वेळेला नाही सांगत येत. पाचशेव्या प्रयोगाला तुम्ही ब्लॅंक होऊ शकता. मी स्वतः झालेलो आहे. म्हणून तर त्याला ‘प्रयोग’ म्हणतो आपण. आयुष्यात नाटक आल्याने ना माझी तयारी खूप झाली. मग पुढे चंद्रकांत कुलकर्णी, माझे गुरू विश्वास सोहोनी, सचिन मोटे-सचिन गोस्वामींसारख्या दिग्दर्शकांबरोबर कामं केली. आणि त्यांनी माझ्यातल्या लेखकावर विश्वास ठेवला. निर्मिती सावंतमुळे खरं तर मी लेखक झालो. म्हणजे अगदी ऑफिशियली असं म्हणता येईल. एक मालिका होती ‘सतराशे साठ सासूबाई’ नावाची. त्यांना अर्जंट लेखक पाहिजे होता. मी अंग काढून घेत होतो, कारण मी मूळचा लेखक नाहीये. ते म्हणाले, ‘कर, तुला  येईल.’ मग त्याचे मी साडेतीनशे एपिसोड लिहिले. खरं सांगू, मला कोणी तयार केलं? अनेक कार्टून चॅनेल्स, जसं की निक (निकलोडिअन) - तर मी अनेक लहान मुलांच्या सीरियल्स लिहिल्या. कुरोचॅन, ऑगी अँड द कॉक्रोचेस, शिनचॅन मी लिहिलेली आहे जवळजवळ वर्षभर. अशा अनेक सीरियल मी दीड-दोन वर्षं लिहिल्यात. लहान मुलांचा विनोद खूप कठीण असतो करायला. तर या सगळ्यामुळे माझं लेखन खूप समृद्ध झालं. इतक्या वर्षांचा तो परिपाक आहे. एका रात्रीत सगळं आलं असं नाहीये ते. 

श्रीपाद ब्रह्मे : कधी असं झालंय का की दुसऱ्या एखाद्याने लिहिलेलं स्किट तुला पटत नाहीय किंवा तुला ते कन्व्हिन्स होत नाहीय?

समीर चौघुले : तसं नाही होत बिलकुल. पण कधी तरी तसं होऊ शकतं. काही काही स्किट्समध्ये असं होतं, की नाही अरे, समथिंग इज राँग! काल रात्री आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत मीटिंगमध्ये चर्चा करतो होतो, की हे ना कुठे तरी चुकतंय. हे आम्हाला माहीत होतं. मी कम्फर्टेबल नव्हतो, की सर, आपण हे नको करू यात. सर पण म्हणाले नको करू या. मग दुसऱ्या दिवशी सरांनी सांगितलं, की हे असं करून बघ, तसं करून बघ. हे आमचं सातत्याने चालू असतं. पहाटे लवकर उठून मी माझ्या मनासारखं लिहून घेतो. बऱ्याच वेळेला असं होतं की मला माझं स्किट लिहिताना माहीत असतं, की मी काय लिहिणार आहे, काय करणार आहे. म्हणजे बऱ्याचदा लोकांना कळत नाही, यात काय हसण्यासारखं! पण लिहिताना ते माझ्या डोक्यात असतं. डोअर फ्रेममध्ये कित्येकदा मी जिना चढून जातो, असं केलेलं आहे; पण अनोळखी व्यक्तीला ते वाचताना कळत नाही. स्क्रिप्टचं वाचन चालू असतानासुद्धा असं वाटतं, की हे बरोबर नाहीये. लिहिताना ते बरोबर वाटलं होतं. काही तरी चुकतंय. सूर चुकतोय कुठे तरी, असं वाटत राहतं. स्किट करताना हा सूर खूप महत्त्वाचा असतो. तो सूर चुकला ना की पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे सगळं स्किट कोसळतं. हे मी अनुभवलेलं आहे अनेकदा. यशापेक्षा अपयश जास्त बघितलंय. स्किट पडताना काय होतं हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. पंधरा मिनिटं जरी असले तरी त्यामागे काही तास सुचायला लागलेले असतात. 
रिहर्सल असते तासन् तास. त्यामुळे एखाद्या अपत्याप्रमणे आम्ही त्याला वागवतो. ते नाही नीट झालं तर मी खूप नर्व्हस होतो. स्किट चांगलं झालं पाहिजे हाच विचार असतो सतत डोक्यात. जोपर्यंत एखादं स्किट मला पटत नाही  तोपर्यंत मी ते ‘ओके’ करायला पाठवत नाही. मीच कन्व्हिन्स नसेन तर मी कसा हसवणार ना तुम्हाला? मी शंभर टक्के कन्व्हिन्स असेन तर मी तुम्हाला हसवीन. मला ते आधी पटलं पाहिजे. आणि विनोद तसाच असतो. तो आधी स्वतःला पटावा लागतो. मला जर पक्का कळला ना, तर मी माझ्या स्किलने तो तुमच्यापर्यंत पोचवणार. मराठी प्रेक्षक प्रचंड सुजाण असतो. त्यामुळे तुम्ही फसवू नाही शकत त्यांना. 

श्रीपाद ब्रह्मे : हल्ली समाज खूप असहिष्णू झालाय. लोकांना लगेच रिॲक्ट करायची सवय झालीये. तर याचा लेखक म्हणून ताण येतो का, की लेखक म्हणून काही गोष्टी आपल्याला लिहिता येत नाहीत?

समीर चौघुले : प्रचंड ताण येतो. कुंपण हळूहळू आकुंचित व्हायला लागलंय. लेखन दिवसेंदिवस कठीण होत चाललेलंय. कोणाची कधी काय भावना दुखावेल, याला काही लिमिटच राहिलेली नाहीये. एका स्किटमध्ये मी एक वाक्य घेतलं, 'मी हुशार होतो ना म्हणून मी सायन्सला गेलो. हा पश्या ढ होता म्हणून तो आर्ट्सला गेला.' तर मला कित्येक आर्ट्सच्या मुलांचे मेसेज यायला लागले, की आर्ट्सची ढ असतात का म्हणून? तुम्ही हे तुम्हाला का लावून घेता? हा पश्या ढ होता म्हणून तो आर्ट्सला गेला, असं म्हणतोय मी. काय झालंय, की प्रत्येक गोष्ट स्वतःला लावून घेण्याची सवय लागलीये लोकांना. मी नेहमी सांगतो की ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये पु. ल. देशपांडे यांनी जी साक्ष केलेली आहे ती लिहून दाखवावी कुणी तरी. माझी तीन दैवतं आहेत -  पु. ल. देशपांडे, चार्ली चॅप्लिन आणि रोवन ॲटकिन्सन - ज्याने मिस्टर बिन साकारला आहे तो. ही तीन माझी दैवतं आहेत. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातसुद्धा अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या आत्ता तुम्ही नाही लिहू शकत. आणि ट्रोलिंग हे फुकट झालं आहे. सहजपणे ट्रोल केलं जातं सोशल माध्यमामुळे. त्यामुळे आता आम्ही असं ठरवलंय, की ट्रोलर्सचं आम्ही वाचत नाही. एखाद्या  कामाविषयी काही सूचना आल्या, आम्हाला पटल्या तर आम्ही त्याचा नक्कीच स्वीकार करतो, कधी कधी माफीही मागतो. मागे एकदा आलं होतं की मजा येत नाहीय. म्हटलं ठीक आहे; आम्ही जास्त प्रयत्न करू; पण तुमच्या या अभिप्रायाबद्दल खरंच आभार! सरांपासून सगळे आम्ही हे फॉलो करतोय. तुम्ही टीका केलीत तुम्हाला काय कळतंय असं आम्ही करत नाही ते प्रेक्षक आहेत. ते टीव्ही लावतायत म्हणून आज हे सगळं चालतंय. पण एका ठरावीक मर्यादेनंतर मग आपल्याला कळतं, की हे ट्रोलिंग आहे ते. काही विशिष्ट माणसं सातत्याने ट्रोलिंग करतात तुम्ही कितीही काहीही करा .मग आम्ही अशा माणसांकडे सरळ दुर्लक्ष करतो. ते सोपं आहे आमच्यासाठी. त्यामुळे मी म्हटलं तसं कोणाचं काय होईल काही सांगता येत नाही. लोक म्हणतात सतत तुमच्यावरच विनोद केले जातात, कारण दुसरीकडे करणंच बंद झालेलंय आता. कशावर करणार? ना धार्मिक, ना राजकीय! कोणावरच करू शकत नाही. मग उरले कोण? समीर चौघुले! करा माझ्यावर विनोद! माझ्या दैवतांनीसुद्धा हेच सांगितलंय, दाखवून दिलंय की स्वतःवर केलेला विनोद हा जगातला सर्वश्रेष्ठ विनोद असतो. चार्ली चॅप्लिनच्या गोल्ड रश  सिनेमात ते बूट भाजून खातात असं दाखवलं आहे. हा किती मोठा पॅथॉस आहे! कारण त्या काळी खरंच खायला अन्न नसायचं. हा एवढा मोठा पॅथॉस विनोदाच्या माध्यमातून त्यांनी पोचवला. आर. के. लक्ष्मणांचं  ‘यू सेड इट’ यायचं, ते मला खूप आवडायचं. मिस्टर बिन पण आत्ताच्या जनरेशनला आवडतोय. तो पण तेच करतो. तो गडबड- गोंधळ करतो, तो बावळट आहे म्हणून तर तो आपल्याला आपल्यातला वाटतो ना. कारण मला असं वाटतं की सीमारेषा आहेत, त्यामधनं काम करणं कठीण होतंय; पण कुडीत जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत करत राहणार विनोद. दुसरं काय करू शकतो? 

श्रीपाद ब्रह्मे : आता पाच वर्षं झाली तुमच्या कार्यक्रमाला. तर अशा कार्यक्रमाचं आयुष्य किती असू शकतं असं तुम्हाला वाटतं?

समीर चौघुले : आता ते प्रेक्षकांच्या रुचीवर आहे आणि त्यांच्या अभिरुचीवर आहे असं मला वाटतं. पण दिवसेंदिवस हे करणं मात्र खूप कठीण होत चाललेलं आहे. कारण शेवटी विषय संपतात ना! तसेच विषय केले की ते तसेच रिपीट केल्यासारखे वाटतात. आंबे आपल्याला का आवडतात, कारण ते फक्त मे महिन्यात येतात. आंबे प्रत्येक महिन्यात यायला लागले तर त्याचं नावीन्य कमी होईल. त्यामुळे ते जेवढं कमी असेल तेव्हढं त्याचं आयुष्य वाढेल असं मला वाटतं. आता सध्या मी ‘फोर डेज अ वीक’ करतोय, पण दमछाक करणारं आहे. त्याचं आयुष्य किती आहे हे मला माहिती नाही. पण अजूनही आजतागायत लोकांचं चांगलं प्रेम मिळतं आहे. दुसरं असं, की सध्या सगळ्यांच्याच आयुष्यात ताण अतिशय वाढलाय. आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो, की आम्हाला लगेच कौतुक मिळतं. तुम्ही एकोणीस तास मेहनत केलीत आणि त्याचं कौतुक झालं, की माणूस मानसिकदृष्ट्या खूप शांत होतो. आमच्या आयुष्यात ‘हास्यजत्रा’ आली, त्याचे खूप आभार आम्ही मानतो.

श्रीपाद ब्रह्मे : ‘लोचन मजनू’चं कॅरक्टर डेव्हलप कसं केलंस?

समीर चौघुले : नाना पाटेकरांनी मध्ये मला फोन केला होता. त्यांनी सांगितलं होतं, की असा निवेदक पुण्यात आहे. खोटं बोलू नकोस, चोरलंयस तू! मी म्हटलं त्यांना, की चोरलं वगैरे काही नाहीय. काय झालं, हे पात्र विकसित करताना मी सुचवलं, की तो तसं बोबडं बोलेल. मी सरांना म्हटलं, मी वेगळं करून बघतो. कदाचित काही तरी मिळेल. मग त्याचं कारण आहे, की तो असं का बोलतो? मग तो एक एलिमेंट मिळत गेला. त्याची मजापण आली, की हा असं का बोलतोय? यातल्या विनोदांसाठी अनेकदा ट्रेंडिंग रील्सचाही आम्ही वापर करत असतो. ‘मधुमास’ गाण्याच्या वेळची धमाल त्यातूनच आलीय.

श्रीपाद ब्रह्मे : रोजच्या जगण्यातले अनुभव स्किटसाठी कसे उपयोगाला येतात? कशी असते ती प्रक्रिया?

समीर चौघुले : असे प्रसंग टिपण्याचा डोळा आमच्याकडे तयार झालाय. आम्हाला आलेले विविध अनुभव आम्ही लोकांसमोर मांडतो. फॅन्स जेव्हा फोटो काढायला येतात, तर काहींचा फोटो टायमर १५-२० सेकंद असतो. इतका वेळ लाफ्टर नाही होल्ड करता येत! अनेक वेळा काय होतं, की नवरा-बायको येतात आणि त्यांच्या अचानक लक्षात येतं, की स्टोरेज फुल्ल! मग म्हणतात, नको जाऊ दे! त्यांना काही वाटत नाही, की समोरच्याचा आपण अपमान करतोय. आता त्याच्यावर काय बोलणार आपण? असे अनेक अनुभव आहेत. कधी कधी पासवर्डच विसरतात आणि आम्ही तिथे थांबलोय ते कधी फोटो काढतायत याची. हेच अनुभव तुम्हाला ‘हास्यजत्रे’त दिसतात, जे तुम्ही केलेलं असतं किंवा बघितलेलं असतं. दोन महिन्याची सुट्टी देतं चॅनेल आम्हाला. आम्ही माणसांत फिरतो. लग्न अटेंड करतो. लग्नात तर खूप किस्से मिळतात. ती बाई कशी चालतेय, तिचा आवाज कसा आहे, तिचा नवरा आणि तिचे रिलेशन कसं आहे... हे सगळं आम्ही बघत असतो. पु.लं.नी तेच सांगितलंय की जेवढी तुमची निरीक्षणशक्ती जास्त, तेवढी तुम्हाला विसंगती दिसायला लागते. आमच्या कोअर टीमला ती विसंगती टिपायची सवय झालीय. विशाखा आणि माझी जोडी लोकांना आवडण्यामागे, ही जोडी ओबडधोबड होती हेच कारण आहे. त्यात विसंगती आहे, खडबडीतपणा आहे, खरखरीतपणा आहे त्या जोडीमध्ये. दोघेही एकमेकांना विरुद्ध आहेत; पूरक नाहीयेत. त्यामुळे ती जोडी बघायला मजेशीर वाटतं. 

श्रीपाद ब्रह्मे : विनोदी अभिनेता, लेखक म्हणून तू कुठली पुस्तकं जास्त वाचतोस?

समीर चौघुले : माझी भगवद्गीता काय आहे सांगू का? - 'व्यक्ती आणि वल्ली.' एका अभिनेत्याला हे पुस्तक पाठ पाहिजे, असं मला वाटतं. आधी व्यक्ती आणि वल्ली पुस्तक वाचायचं, त्यानंतर पु. लं.चं कथाकथन ऐकायचं अशी मी सुरुवात केली. त्यात तुम्हाला कळून जातं काय आहे ते! मी स्वतःला भाग्यवान समजतो, की मी पु. लं.ची दोन मोठी नाटकं केली आहेत. एक म्हणजे वाऱ्यावरची वरात, जे श्रीकांत मोघेंनी बसवलं होतं. आणि मी श्रीकांत मोघेंनी केलेले रोल केले होते. मग त्यात कडवेकर मास्तर आहे, शिरप्या आहे - जो ‘दिल देके देखो’ नाचतो ते आणि ‘परोपकारी गंपू’ केलाय ‘व्यक्ती आणि वल्ली’त. त्यामुळे पु. ल. देशपांडे यांचं लेखन माझ्यासाठी भगवद्तगीता आहे, बायबल आहे. त्यांचा विनोद मला खूप आकर्षित करून गेला. मी अचंबित व्हायचो लहानपणी की हे एका माणसाला कसं जमू शकतं. ‘गुळाचा गणपती’ तर सबकुछ पु. लं. देशपांडे! ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये जो सुरुवातीचा सीन आहे, जिथे त्याचं स्वागत होतं, आणि सगळे 'स्वागत करू या सकलजनांचे' म्हणत सगळे त्यांची विकेट उडवत असतात. आणि त्यावर पु. लं.च्या रिॲक्शन्स बघा. तिकडे मी अभिनेता म्हणून मी पु.लं. कडे खूप आकृष्ट झालो. ॲक्टिंग सगळेच करतात, पण रिॲक्शन देणारा विनोदात खूप मोठा असतो. ‘गुळाचा गणपती’ बघितल्यावर तर मी गुळासारखा चिकटलो त्या लेखकाला. त्यांची एकेक पुस्तकं बघा. शाळेत असल्यापासून पारायणं केलीत या सगळ्या पुस्तकांची. ‘सुंदर मी होणार’सारखं नाटक त्यांनी केलं कसं? त्यांनी रूपांतर केलं असेल, मग यासाठी आधीचं मूळ नाटक वाचा, पिक्चर आलाय तो चित्रपट बघा. ‘माय फेअर लेडी’ बघा, त्यावरून केलेलं एक नाटक आहे ते बघा. हा अभ्यास प्रत्येक लेखकाने केला पाहिजे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की या सगळ्या स्टेशनांवर उतरत उतरत ‘हास्यजत्रे’च्या स्टेशनवर आलो आहे. इंडस्ट्रीत येताना नेहमी शटलने आलं पाहिजे. बुलेट ट्रेनसारखे नको. नेहमी या एकेका स्टेशन्सवरून यायला पाहिजे. मला शिरीष कणेकरांनी पण खूप आकृष्ट केलं. ते खूप कनेक्टेड होते. ते ‘हास्यजत्रा’ बघायचे. त्यांनी स्वतःहून मला फोन केला होता. तेव्हापासूनचा मी त्यांचा फॅन आहे. क्रिकेट माझा धर्म आहे. फटकेबाजी, फिल्लमबाजी ही सगळी पुस्तकं माझ्याकडे आहेत. विजय तेंडुलकरांचं 'शांतता कोर्ट चालू आहे' हे नाटक मी केलं. त्याच्यात 'बाळू' नावाची भूमिका मी केली होती. त्या वेळेस मला कळलं की ट्रोलिंग हे किती वर्षांआधी सुरू झालंय. एक उच्चभ्रू, सुशिक्षित समाजाने केलेले एका बाईचं ट्रोलिंग आहे. हे कालबाह्य झालेलंच नाहीये नाटक. जयवंत दळवींसारखा नातेसंबंधांवर भाष्य करणारा एवढा मोठा लेखकच मी नाही बघितला. तेंडुलकरांचं ‘पहिलं पान’ वाचा तुम्ही. प्रत्येक वाचकाला अख्खा सेट डोळ्यासमोर उभा राहतो. म्हणजे फटीतून एका कवडसा येत असतो, हेसुद्धा त्यांनी लिहून ठेवलेलंय. हे कोण लिहितं सध्या? हा त्या काळी आमचा अभ्यासच होता. माझे गुरू विश्वास सोहोनी यांनी खूप आम्हाला शिव्या घातल्या. आमच्या चांगल्यासाठीच! पण त्यामुळे आम्ही रंगभूमीकडे खूप गांभीर्याने बघायला लागलो. कॉमेडी इज अ सीरियस बिझनेस! एव्हढं सोप्पं नाहीय. त्याकडे गांभीर्याने बघा. रंगभूमी खूप गांभीर्याने करायची गोष्ट आहे. हे लेखक आमच्या आयुष्यात आले आणि त्यामुळेच आमचं वाचन सुरू झालं. त्याला पर्याय नाही. मी साहित्य संमेलनात गेलो आहे. सर्वांत जास्त झुंबड पुस्तकांकडेच असते. करोनाकाळात तर आम्ही मोबाइलवर स्क्रिप्ट पाठवायचो. मजाच यायची नाही. जोपर्यंत हाताला कागद लागत नाही ना, तोपर्यंत स्क्रिप्ट नाही नीट होत मग! पुस्तकाची सवय लागलीय हाताला, ती कधीही जाणार नाही आता. वाचनाची ओढ आहे ती पुढच्या पिढीपर्यंत दिली गेली पाहिजे. माझा मुलगा कुठे मॉलमध्ये गेला, की आधी क्रॉसवर्ड शोधतो. ती ओढ मी माझ्या मुलाला दिलीय. हा वारसा पुढे नेणं हे प्रत्येकाने केलं पाहिजे. मला आशा आहे, की माझा मुलगाही हा वारसा पुढे नेईल.
शेवटी सगळ्यांत खरं तर कौतुक आणि आणि आभार मानायचेत ते सोनी मराठी आणि संपूर्ण टीमचे. ‘सोनी मराठी’चे जे आमचे हेड आहेत अजय भाळवणकर किंवा अमित फाळके हे किंवा गणेश सागडे ही अख्खी टीम पीआर टीम ओंकार लीड करतो किंवा नॉन फिक्शन-फिक्शन टीम या सगळ्यांचे मला आभार मानायचे आहेत, कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नसतं झालं. विश्वास टाकणं ही फार मोठी गोष्ट आहे. विनोदाच्या बाबतीत खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही त्यात जेवढा कमी इंटरफिअरन्स ठेवाल तितका विनोद खुलतो. विनोद कधीही काट्यांमध्ये खुलत नाही. तो त्याचा त्याचा खुलतो. आज ती पाकळी खुलेल, उद्या ती पाकळी खुलेल. तीच गंमत असते, जी अनप्रेडिक्टीबिलिटी आहे त्याला कुठेही इजा नाही होऊ दिलेली. ‘सोनी मराठी’सारख्या नवीन चॅनेलवर हा कार्यक्रम सुरू झाला ही गोष्टपण आमच्या खूप पथ्यावर पडली. त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार!


-------------------------------------------


अक्षरधारा दिवाळी अंक २३ लेख - भाग १

‘‘हास्यजत्रे’नं आम्हाला जगवलं…’


महाराष्ट्राला आणि मराठी भाषेला विनोदाची मोठी परंपरा आहे. मौखिक साहित्य, लोकसंस्कृती, लोककला, मुद्रित साहित्य, चित्रपट, नाटक यांतून विनोदनिर्मितीचे काम अव्याहत सुरू आहे. तमाशा असो, गण-गवळण असो, वग असो, भारूड असो की कथा-कीर्तन असो; विनोदाचे अस्तर सर्वत्र दिसते. थोडक्यात, महाराष्ट्राला विनोद नवीन नाही. लेखकांमध्येही चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे यांच्यापासून ते द. मा. मिरासदार, शंकर पाटील यांच्यापर्यंत विनोदाची मोठी परंपरा दिसते. कलाकारांमध्येही दामूअण्णा मालवणकरांपासून ते दादा कोंडके ते अशोक सराफ अशी मोठी ‘रेंज’ दिसते. विसावे शतक ओलांडताना महाराष्ट्रात मराठी वाहिन्या सुरू झाल्या आणि तिथेही सुरुवातीपासूनच विनोदी कार्यक्रमांचे पेव फुटले. मात्र, फारच थोडे कार्यक्रम रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवू शकले. ‘सोनी मराठी’ वाहिनीवर सुरुवातीपासून सुरू असलेला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम अशा मोजक्या कार्यक्रमांपैकी एक. सध्या महाराष्ट्रात हा कार्यक्रम आणि यातील सर्व कलाकार सर्वांना मनमुराद हसवण्याचं काम मोठ्या निष्ठेनं करत आहेत. अश्लीलता किंवा कमरेखालच्या विनोदाचा आसरा न घेता, केवळ प्रसंगनिष्ठ आणि जोडीला शाब्दिक, कायिक विनोदाच्या साह्याने हा कार्यक्रम रंगत जातो. त्यामुळेच तो अतिशय लोकप्रिय आहे. ‘अक्षरधारा’च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने ‘हास्यजत्रा’चा हा सर्व प्रवास सर्वांगाने जाणून घ्यावा आणि हा विनोदनिर्मितीचा प्रवास कसा होतो, हे आपल्या वाचकांपर्यंत पोचवावं म्हणून या अंकात ‘हास्यजत्रा’चे कर्ते-करविते दिग्दर्शक सचिन गोस्वामी व लेखक सचिन मोटे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सोबत ‘सोनी मराठी’ वाहिनीचे प्रमुख अजय भाळवणकर व सीनियर क्रिएटिव्ह डायरेक्टर अमित फाळके यांच्याशीही गप्पा मारल्या. आणि अर्थात, यातील प्रमुख कलाकार समीर चौघुले यांच्याशीही आम्ही संवाद साधला, यासाठी ‘अक्षरधारा’चे रमेश राठिवडेकर, रसिका राठिवडेकर, शिवानी राठिवडेकर, ‘अक्षरधारा’च्या कार्यकारी संपादक स्नेहा अवसरीकर यांच्यासह ‘सोनी मराठी’च्या मीरा रोड (मुंबई) येथील स्टुडिओत पोचलो. तिथं ‘हास्यजत्रा’च्या पुढील भागांचं चित्रीकरण सुरू झालं होतं. ‘सोनी मराठी’च्या जनसंपर्क विभागाच्या सहकाऱ्यांनी आमचं आगत-स्वागत केलं. शूटिंगमधून वेळ मिळेल तसतसं एकेक कलाकार येऊन मुलाखत देऊन जात होता. या सगळ्यांशी बोलताना ‘हास्यजत्रा’ची निर्मिती कथा उलगडत गेली. नंतर आम्ही प्रत्यक्ष चित्रीकरणाचाही अनुभव घेतला. हे सर्वच कसलेले कलाकार असल्यानं अतिशय व्यावसायिक सफाईनं, पण उत्स्फूर्तपणे काम करत होते. आम्ही गेलो, तेव्हा परीक्षक म्हणून सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ जाधव होते. प्रसाद ओक यांची भेट काही होऊ शकली नाही. या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका प्राजक्ता माळी मात्र भेटली. या सर्वांशी साधलेल्या संवादातून ‘हास्यजत्रे’च्या निर्मितीचं काही-एक सूत्र शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला. निर्माते, लेखक, दिग्दर्शक, कलाकार, पडद्यामागचे तंत्रज्ञ हे सर्वच अतिशय मेहनतीने हा खेळ उभा करतात, हे नक्कीच जाणवलं.

----


‘कॉमेडी इज ए सीरियस बिझनेस’

(सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांची मी घेतलेली प्रकट मुलाखत...)

नमस्कार,

अक्षरधाराच्या दिवाळी अंक उपक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा सोनी मराठीवरील कार्यक्रम गेली पाच वर्षे सुरू आहे. अतोनात लोकप्रिय आहे. महाराष्ट्रभर लोकप्रिय आहे. जिथे जिथे मराठी मंडळी आहेत तिथे सर्व ठिकाणी हा कार्यक्रम बघितला जातो. हास्यजत्रा हे काय प्रकरण आहे? हास्यजत्रा या कार्यक्रमाची निर्मिती कशी झाली? त्यामागे काय काय परिश्रम आहेत? त्यांच्या कल्पना काय आहेत? हा कार्यक्रम एवढा लोकप्रिय का आहे? या कार्यक्रमाची निर्मिती कशी होते? त्यामागच्या पडद्याआडच्या काही घडामोडी या सगळ्यांची एक बित्तंबातमी आपल्या वाचकांना द्यावी, असं आम्ही ठरवलं. त्यासाठी ‘हास्यजत्रा’चे सर्वेसर्वा म्हणता येतील असे लेखक, दिग्दर्शक व निर्माते सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांच्याशी आम्ही संवाद साधला.

श्रीपाद ब्रह्मे : नमस्कार दोन्ही सचिन सर. मी आधी सचिन मोटे यांना विचारतो की, मुळात ‘सोनी मराठी’कडे तुम्ही कसे आलात? संकल्पनेच्या पातळीवर हा प्रवास कसा सुरू झाला?

सचिन मोटे : ‘सोनी मराठी’वर हा कार्यक्रम करण्याआधी आम्ही दोघांनीही गेली २०-२५ वर्षं विनोद या प्रांतामध्ये बऱ्याच ॲक्टिव्हिटीज एकत्र केलेल्या आहेत. म्हणजे काही नाटकं केली आहेत. काही चित्रपट केले आहेत आणि काही मालिका एकत्र केल्या आहेत. आमच्या दोघांची ‘वेटक्लाउड प्रॉडक्शन्स' नावाची निर्मिती संस्था आहे‌. सोनी मराठीने ‌‘वेटक्लाउड प्रॉडक्शन'ला सांगितलं, की आपल्याला एक मालिका हवी आहे. आम्ही दोघांनीही याआधी असे काही विनोदी कार्यक्रम केले होते. अमित फाळके आणि अजय भाळवलकर यांची एक कल्पना होती, की आपण एकत्र मिळून एक कॉमेडी शो करू या. मराठी वाहिनीवर कॉमेडीला एक मोठं स्थान असतं. या नव्या वाहिनीची ओळख व्हावी, असा कार्यक्रम असावा, अशी मूळ कल्पना होती. आम्ही मग सुरुवातीला भेटलो आणि भेटल्यावर त्या चर्चेतूनच मग आम्ही हास्यजत्रा हे नाव ठरवलं. मग भाळवलकर सरच म्हणाले, की आपण त्याला ‌‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' असं नाव देऊ या. कारण ती एक मोठी ‌‘अम्ब्रेला' असेल. ‌‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’तून आपण संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहोत. सगळ्या महाराष्ट्रातून विनोद, तिथल्या प्रातिनिधिक भाषा या सगळ्यांना एकत्र आणून आपण काही तरी करू या, अशा विचारातून त्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. मग या कार्यक्रमाची एकूण मांडणी तयार झाली. सुरुवातीला आम्ही एक स्पर्धा स्वरूपात हा कार्यक्रम केला होता. त्या स्पर्धांच्या सीझनमधूनच आम्हाला कलाकारांचा आजचा जो संच आहे तो हळूहळू गवसत गेला. काही कलाकार आधीपासूनच आमच्या बरोबर होते. काही कलाकार स्पर्धेतून आले. काही कलाकार आधी होते, पण त्या स्पर्धेतून त्यांच्यातील टॅलेंट जास्त जाणवलं आणि त्यातून आजचा हा संच तयार होत गेला. 

श्रीपाद ब्रह्मे : सचिन गोस्वामींना पुढचा प्रश्न विचारतो. हा संच तयार झाल्यानंतर दिग्दर्शक म्हणून तुमच्याकडे सगळी मोट बांधायची हे काम आलं असेल. तर त्या पातळीवर तुम्ही काय विचार केला? कारण त्या वेळी महाराष्ट्रात इतर वाहिन्या होत्या. त्या वाहिन्यांवर लोकप्रिय असे विनोदी कार्यक्रम सुरू होते. मग ‘सोनी मराठी’वरील आपला कार्यक्रम वेगळा कसा ठरेल, लोकांनी तो का बघावा यासाठी तुम्ही नक्कीच काही विचार केला असेल. तो काय प्रवास होता? त्या संकल्पनेच्या पातळीतून तुम्ही पुढे कसा नेला तो कार्यक्रम?

सचिन गोस्वामी : एखादा कार्यक्रम जेव्हा यशस्वी होतो तेव्हा तो सामूहिक प्रयत्नातून यशस्वी होतो. कुणा एकट्याच्या विचारावर कधी कार्यक्रम चालत नाही. अशा पद्धतीचे अनेक सामूहिक प्रयोग केल्यानंतर मात्र एक अंदाज यायला लागतो. म्हणजे प्रेक्षक कळणं ही एक भ्रामक कल्पना आहे. पण साधारणत: अंदाज येतो, की या या टप्प्यावर असं असं केलं तर साधारणत: अशी प्रतिक्रिया असते. तर तो अनुभव आमच्या दोघांच्या गाठीशी होता. इतर वाहिन्यांवरील अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही केले होते. त्यात काही चुका केलेल्या होत्या. काही बरे झाले होते. त्या प्रतिक्रियांतून तो अंदाज येत होता. हा कार्यक्रम सुरू होण्याच्या एक वर्ष आधी आमच्याच प्रॉडक्शन हाउसचा अशाच प्रकारचा एक विनोदी कार्यक्रम दुसऱ्या वाहिनीवर सुरू होता आणि तोही खूप लोकप्रिय झाला होता. त्याचे जवळ जवळ ४१३ एपिसोड झाले होते. तोसुद्धा त्या वाहिनीचा मुख्य कार्यक्रम म्हणून पाहिला जात होता. तशा प्रकारचाच एक शो आपण इथे परत करायचा म्हटल्यावर, तुम्हाला तुम्हीच केलेला आराखडा पुन्हा पुसून नवीन आराखडा आखायचा असतो. त्याचे स्वरूप तेच असतं. विनोदीच करायचा आहे; या या अभिनेत्यांना घेऊन त्या मर्यादेतच करायचा आहे; पण मागचे आराखडे पुसले आणि यातले हे कोन वापरायचे नाहीत असं ठरलं तर नवीन आकार आपल्याला आखता येतो. तसं काहीसं इथे झालं. मागच्या कार्यक्रमात आम्ही जे ‌‘स्किट्स' करायचो त्या स्किट्सना संख्येची मर्यादा होती. म्हणजे त्या वेळी तीन जणांनी ते करायचं. आता चार जणांत करतो. त्यातले बरेचसे स्किट्स घडून गेलेल्या गोष्टींवर भाष्य करणारे होते, कॉमेंट बेस्ड होते. वर्षभरानंतर त्याच्यावर पुन्हा पुन्हा विचार केल्यानंतर आमच्या लक्षात आलं, की जसा काळ बदलतो तसे विनोदाचे प्रमाण बदलतं, पद्धत बदलते. ज्या वेळी आपण या चॅनेलसाठी पुन्हा काम करतो आहोत, त्या वेळी विनोदाचे सोर्सेस पण खूप वाढले आहेत. इंटरनेट आलं म्हणजे आज प्रत्येकाच्या मोबाइलवर आता विनोद येतो. ‘शुभ सकाळ’ आणि ‘विनोद’ अशी परंपराच आहे आपल्याकडे! त्यामुळे रोज इतका विनोद इतक्या सोर्सेसमधून तुमच्यापर्यंत येतो तर त्या विनोदाच्या पलीकडे एक विनोद साधायचा तर काय करता येईल? त्या वेळी आमच्या असं लक्षात आलं की आपण भूतकाळावर खूप कमेंट करणारे स्किट्स जास्त केले आहेत, तर आता ते टाळायचं. या प्रकारामध्ये आम्ही ठरवलं, की जे आपण करू ते तिथे घडणारं असेल! असं ठरवल्यावर मग घटना जास्त महत्त्वाच्या झाल्या. सिच्युएशनल कॉमेडीच्या अंगानं आमचा विचार सुरू झाला. आता साडेसातशे भाग झाले आहेत. त्यातले ९० टक्के भाग आणि स्किट्स असे आहेत, की ते त्या ठिकाणी घडणाऱ्या घटना आहेत. मुळात एखाद्या कार्यक्रमाचं आरेखन करणे म्हणजे त्याची फक्त दिशा ठरवावी लागते. मग दर आठवड्याला तो कार्यक्रम तुम्हाला सांगत जातो की तू आतापर्यंत हे केलंस ना, आता हे केलं पाहिजे. हे हे नीट नाही झालं. हे चांगलं झालं. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया, नटांनी सादर केलेले स्किट्स, लेखकांनी, सगळ्यांनी मिळून तयार केलेले स्किट्स ते कागदावर कसे होते, ते रंगमंचावर आल्यावर कसे झाले, त्याच्यावरच्या संकलनाच्या सगळ्या संस्कारांनंतर ते कसे झाले आणि ते टीव्हीवर नऊ वाजता ज्या वेळी आपण घरी पाहतो तेव्हा तिथल्या सगळ्या वातावरणातल्या ध्वनींमध्ये कसं पोहोचतं, याचा एकदा अंदाज आला, की मग तुम्हाला कळतं, की तुम्ही तिथे तुमचं शंभर टक्के योगदान दिलं होतं ते नऊ वाजता फोडणीच्या आवाजात, घरातल्या भांड्यांच्या आवाजात, माणसांच्या ये-जा करण्यात, दारावरची वाजणारी बेल या सगळ्या आवाजांत ते फक्त साठ टक्केच पोहोचतं. मग त्याचा व्हॉल्यूम काय असला पाहिजे, बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, त्याच्यावर आम्ही सतत आमच्या टीमबरोबर चर्चा करीत असतो. कदाचित याचं यश काय आहे, तर आम्ही सगळे नेहमी एका मार्गावर राहण्याचा प्रयत्न करतो. दर वेळेला स्किट संपलं, की सगळी टीम मिळून आम्ही पाच मिनिटे बोलतो. तो काही ब्लेम गेम नसतो. तेथे आम्ही ‌‘हे आज फसलंय, हे थोडं लेन्दी झालंय किंवा आज छान झालंय,’ असं कौतुकसुद्धा शेअर करतात हे लोक. ‘हे अचानक केलेलं मस्त झालंय, ते पूर्वनियोजित केलेलं चांगलं नाही झालं,’ असं प्रत्येक स्किटचं मंथन प्रत्येक वेळी घडत जातं. तसं एकूण प्रयोगाचंसुद्धा आम्ही दर वर्षाला एकदा बसून ठरवतो की हे हे आपण केलंय, हे हे नाही करायचं, हे करायचं. याचं दिग्दर्शन, आरेखन असं आहे, की तुम्हाला सतत वास्तवात राहायचंय आणि प्रत्येक वेळी घडलेल्या गोष्टींचं मूल्यांकन करून पुन्हा पुढे जायचंय. अशी साधारणत: ती आखणी असते. 

सचिन मोटे : सचिन जे म्हणाला ना, त्याचं उदाहरण सांगतो. बोलताना आम्ही पटकन बोलतो की आता घडतंय आणि ॲक्च्युअली एखादा परफॉर्मन्स घडत असतो त्या वेळी तो दोन काळांत असतो. इथे वर्तमानकाळात तिथे चाललेलं असतं. वर्तमानकाळातील ती पात्रं आपल्याला दिसत असतात. आधी काय व्हायचं, तिथे वर्तमानकाळ सुरू असायचा आणि ते दोघे जण भूतकाळाबद्दल बोलत असायचे. तुम्ही आबूराव-बाबूराव घ्या, तुम्ही गण-गवळण बघा किंवा जुने आपले शो - स्टँडअप आठवा. तिथे दोघे येतात आणि मग एक लग्नकार्याला आलेला म्हातारा असतो. त्याला लग्न कार्यालयाचा आयोजक तो वेगवगेळ्या कंडिशन्स सांगत जातो आणि त्यातून एक विनोद तयार होतो. आमच्या इथं परवा असं झालं होतं. मागच्या वेळी त्या नवरदेवाने अक्षता फेकल्या, त्याबरोबर नवऱ्या मुलीच्या का कुणाच्या तरी डोळ्यांत गेल्या; भटजींना त्याचा त्रास झाला वगैरे असं सगळं ते फक्त लिहिलेलं असायचं. आता आम्ही तो समारंभ ॲक्च्युअली करतो. आता खरंच समीर चौघुले रांगेत उभा आहे आणि विशाखा सुभेदारनं साकारलेली एक म्हातारी येऊन त्याच्यातलं खातेय असं सगळं! याचा जास्त आनंद सगळ्यांना मिळायला लागला. आता विनोदी फटकारे, ताशेरे आणि विनोद तिथे घडायला लागला. त्यामुळं त्याचं एक वेगळेपण जाणवायला लागलं. 

सचिन गोस्वामी : आम्ही जे टप्प्याटप्प्यानं करत आलो होतो तेव्हा आम्हाला जाणवलं की चुटकुले सांगणे ते नाटुकलं घडवणे यापर्यंत आम्ही आलो. बारा मिनिटांत ते पंधरा मिनिटांत चुटकुले सांगत सांगत लोकांना हसवणं इथून सुरू झालेला, स्टँडअप कॉमेडीपासून सुरू झालेला हा फॉर्म आता पंधरा मिनिटांची तीन नाटुकली म्हणजे एक भाग असं झालं. टी-२० सारखं समजा! 

सचिन मोटे : याची निकड हळूहळू करताना जाणवत जाते. आधीच्या पेक्षा आपल्याला थोडं तरी पुढे जायचं असतं. त्यातून आम्ही इथपर्यंत आलो. 

सचिन गोस्वामी : याचेही तुम्ही सुरुवातीपासूनचे भाग बघाल तर ते दोन किंवा तीन पात्रांचेच आहेत. पण हळूहळू विषयाला मर्यादा यायला लागते. प्रिमाइस तोच असतो. अशा वेळी तुम्हाला स्वरूप बदलायला लागतं. मग ज्या वेळी कॅरेक्टर वाढतील त्या वेळी वेगवेगळी लोकेशन्स घ्यायला लागतात. गणपती दर्शनासाठी आलेली रांग हा तीन जणांमध्ये टाळला गेलेला विषय असतो. किंवा एखादा जोडीसाठी केलेला विषय विचारात घेतला जात नाही. पण नवरा-बायकोची गणपती दर्शनाला जाण्याची चर्चा, या सर्वांचे निमित्त या सगळ्या चौकटीत तो विषय राहतो. ज्या वेळी आपण एखाद्या समूहाला दूर करायचं ठरवतो तेव्हा तेच नवराबायको गणपती दर्शनाच्या रांगेत आहेत हा एक नवा परिसर मिळतो. आता दोन-तीन कॅरेक्टरची स्किट्स आता आठ, दहा, बारा अशा पात्रांमध्ये यायला लागली आहेत. मग हळूहळू सूचक नेपथ्याला जास्तीत जास्त रिॲलिस्टिक करण्याचा प्रयत्न केला जातो. शेवटी ते त्या मर्यादेतच असतं, भासमानच असतं. पण तो भास तयार होईल आणि ते खरं वाटेल इतपत ते कॅरेक्टर आम्ही रचायला लागलो. 

श्रीपाद ब्रह्मे : लेखक म्हणून आता जेव्हा एक अशी चौकट ठरली की आता आपल्याला सिच्युएशनल कॉमेडीकडे जास्तीत जास्त जायचं आहे. नंतर नंतर तो प्रवास दोन कॅरेक्टरकडून अधिक कॅरेक्टरकडे जाऊ लागला. तर मग हे सर्व लेखक मंडळींना हे कितपत आव्हानात्मक होतं? कारण तुम्हाला पूर्वी एका पद्धतीने लिहायची सवय असेल किंवा तशा पद्धतीचे विनोद सहज निर्माण केले जात असतील. पण आता मात्र तुम्हाला एका वेगळ्या प्रतलावर खेळायचंय. तर लेखक म्हणून तुम्ही हे कसं जमवलं?

सचिन मोटे : लेखक म्हणून काम करताना तसं एक टीम आमच्या सोबत होतीच. मी आणि सचिन स्वत: दोघंही एकत्र कॉन्सेप्ट डेव्हलप करीत असू. यात आम्हाला समीर चौघुले सोबत होता. तो स्वत: परफॉर्मर पण आहे आणि लेखक पण आहे. प्रसाद खांडेकरही परफॉर्म करतो आणि लेखक पण आहे. त्यानंतर आम्हाला पहिल्या दोन सीझनमध्येच श्रमेश-प्रथमेश अशी एक रत्नागिरीची मस्त जोडी मिळाली. ते स्वत: उत्तम लेखक आहेत आणि अभिनय करणारे आहेत. आता लेखक आणि अभिनय हे दोन करणाऱ्यांना स्वत:चा परफॉर्मन्स बघत बघत लेखन करण्याची सवय असते. परफॉर्मन्स ओरिएंटेड रायटिंग त्यांच्याकडून आपोआप होत असते. समीर त्याची कॅरेक्टर लिहिताना मी कसं करेन असे करून त्याला एक लिहिण्याची सवय असते. असे लेखक होते. त्याचबरोबर आमच्या फळीमध्ये असे काही लेखक आले, की त्यामध्ये विनायक पुरुषोत्तम म्हणून आमच्या शोचा लेखक आहे तो आमच्या इथे सहायक दिग्दर्शक म्हणून होता. ज्याने सचिनला साहाय्य केलं होतं. त्याला लेखक व्हायचं काही डोक्यात नव्हतं. त्याला हळूहळू धरून लेखक म्हणून आणला. त्याला जरा सुचतं. पहिल्या स्किटपासूनच आमच्या दोघांच्या लक्षात यायला लागलं की हा मध्ये मध्ये छोटे काही तरी विनोद पुरवत/सुचवत असतो. शाब्दिक विनोद त्याला सुचतात. मग तो आला. अमोल पाटील आमच्याबरोबर काम करतो. त्यालाही नर्मविनोद लिहिण्याची चांगली शैली आहे. त्याच्यानंतर हृषिकांत राऊत म्हणून एक लेखक आहे. अभिजित पवार हा एक उत्तम अभिनेता असलेला लेखक आम्हाला जॉइन झाला. महाराष्ट्रात विनोदी लेखनाची एक मोठी परंपरा आहे. तिचा नाही म्हटलं तरी सगळ्यांमध्ये खूप परिणाम असतोच. सचिनने पण मराठी विनोद पूर्वीपासून वाचलेला आहे, बघितलेला आहे. आपण सगळेच जण अगदी शंकर पाटील, द. मा. मिरासदार वाचत; (वसंत) सबनीसांची नाटकं, वेगवेगळी विनोदी नाटकं बघत बघत आपण मोठे झालो. या सगळ्या लेखकांमध्ये तो विनोद होताच. त्यातून आजच्या काही स्टँडअप विनोदवीरांकडे एक जो काही थोडा अपमानाकडे जाणारा विनोद आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. कपिल शर्मा शो अशा कार्यक्रमांतून आलेले ते फ्लेवर्स आहेत. तसा तो आपल्या मातीतलाही विनोद आहे. तर वेगवेगळे लोक इथे विनोदाचा फ्लेवर घेऊन एकत्र आले. त्या सगळ्यांत आम्ही दोघं पहिल्यापासूनच सिच्युएशनल कॉमेडी करणारे. म्हणजे आमची सगळी नाटकं तुम्ही बघितली तर ती प्रसंगनिष्ठ आहेत. त्यामुळे आम्ही सिच्युएशन कॉमेडी करणारे आणि त्याच्यातले हे छोटी छोटी वैशिष्ट्यं असलेली लोक हे सगळे एकत्र आल्यामुळे एक वेगवेगळ्या पद्धतीचा विनोदाचा एक छान गुच्छ तयार झाला. जसा तुम्हाला इथे नटांचा एक चांगला गुच्छ दिसतो ना, तसा तो तिकडे लेखकांचा आहे. अर्थात त्यांच्यातील प्रत्येकाचं छोटं छोटं वैशिष्ट्य आहे. कुणी अजून खुलतंय. कुणी पूर्ण एका पद्धतीचे खुललेलं आहे. आम्ही वेगळ्या, नव्या लेखनाच्या कायम शोधातही असतो. या विविध पद्धतीच्या लेखकांमुळे हे झालं. सगळ्या गोष्टी तयार झाल्या आणि आम्ही वेगवेगळ्या गोष्टी रचत गेलो. त्याच्यात आम्हाला वेगवेगळी कॅरेक्टर्स सापडत गेली. सचिन स्वत: कॅरेक्टर्स खूप छान डेव्हलप करतो. म्हणजे आमचं होतं असं, की आम्ही एक प्रसंग करतो. जो लिहिलेला असतो तो प्रसंग इथे डेव्हलप होतो. तो प्रसंग करताना कलाकारांना काही छान लकबी देतो आणि ते तसं परफॉर्म करतात. त्यातून कदाचित आम्हाला मग लेखक आणि प्लस याने परफॉर्म केलेल्या गोष्टी याच्यातून आम्हाला सीरीज मिळत जातात. उदा. ‘लॉली’चं कॅरेक्टर. नम्रता संभेरावचा परफॉर्मन्स, लेखक आणि शिवाय दिग्दर्शन करताना ज्या गोष्टी घडल्या, त्यातून आम्हाला आणखी पुढच्या शक्यता दिसत गेल्या. समीर चौघुलेंची बरीचशी कॅरेक्टर्स असतील. ‘लोचन मजनू’पासून ते अनेक कॅरेक्टर्स बघत असाल. प्रसाद खांडेकरांची स्लो-मॅनपासून अनेक कॅरेक्टर्स बघितली असतील किंवा पृथ्वीक प्रताप वेगवेगळी कॅरेक्टर्स करतोय. सगळे जण आम्ही थोडे गोष्ट सांगणारे असल्यामुळे एक गोष्ट सापडली, की त्या गोष्टीला दुसरा डबा आता कसा जोडता येईल, तिसरा कसा जोडता येईल, त्यातून या सातशे भागांची अख्खी रेल्वे तयार झाली. नाही तर ते तिथेच संपून गेलं असतं. आजही असं होतं, की एखादी गोष्ट करून झाली की वाटतं, याची सीरीज होऊ शकेल. ती गोष्ट पहिल्यांदा करताना आम्हाला माहिती नसते की याची सीरीज होणार आहे म्हणून. ‘लोचन मजनू’ ही तर अगदी अलीकडच्या काही काळात सापडलेली सीरीज आहे. सचिन म्हणाला, की आपण समीर चौघुलेला सतत त्रास देतोय. समीर चौघुले इतरांना त्रास देईल असं काही तरी करू या. त्याच्यातून काय करता येईल? मग निवेदक आणू या. मग तो पहिलाच सहज म्हणून पाचशेवा प्रयोग आम्ही केला. मी म्हटलं की अरे, हा पाचशेवा प्रयोग होऊच द्यायला नको आपण! याचा पाचशेवा प्रयोग होतच नाहीये असं त्यांना आपण प्रत्येक वेळी करत जाऊ या आणि मग त्याच्यातील एक एक गोष्टी मिळत जातात. अशीच आम्हाला शंकऱ्याची एक लव्ह स्टोरी मिळाली आहे. ती तर एक गावातील लव्ह स्टोरी. पूर्वी ‌‘गोष्टी गावाकडच्या' नावाची एक मालिका असायची. त्या मालिकेचा एक, दोन, तीन भाग चालायचा आणि आपल्याला कळायचं किंवा नुक्कडमध्ये दर आठवड्याला काय व्हायचं त्या दोघांमध्ये, तेच इथेही होतंय. फक्त आता दहा-दहा, बारा-बारा मिनिटांच्या सीरीजमध्ये कुठे कुठे विनोद चालू आहे, कुठे कॅरेक्टर्सचा विनोद चालू आहे, कुठे कुठे सिच्युएशनल कॉमेडी असे वेगवेगळे प्रकार एकत्र जोडत जोडत तयार झालेले आहेत.

सचिन गोस्वामी : आपण जे म्हणालात ना, की हे तुम्हाला कुठं असं जाणवायला लागलं की अमुक अमुक. तर ते तसं नाहीये. जसं उत्क्रांतीत आपण शेपूट कुठं जोडलीय हे कुणाला माहीत नाही, तसंच हे आहे. या प्रवासात नेमका भाग बदलला, पण कुठे बदलला याचा स्पष्ट टप्पा नाही. म्हणजे तो दिवस नाही तुम्ही सांगू शकत, तो क्षण नाही सांगू शकत; पण ते जाणवायला लागतं. जर तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचं मूल्यांकन करत गेला किंवा त्याच्यावर चिंतन करत गेलात तर आपल्याला जाणवतं की हे आता चेंज झालंय. हे नाही वापरायचं. याचा पर्याय काय? ‘लोचन मजनू’ची अजून एक गंमत सांगतो. कधी कधी परिस्थिती तुम्हाला काही गोष्टी क्रिएट करायला लावते. अगदी स्पष्टपणे सांगायचं तर विशाखा ज्या वेळी शोमधून जेव्हा बाहेर गेली, त्यानंतर त्यांचा एक फॉरमॅट होता ‘जाऊ या गप्पांच्या गावा’; त्या फॉरमॅटचं काही तरी समांतर एक स्वरूप यायला हवं होतं. काय होतं की एखादा फॉरमॅट, एखादी कलाकृती त्या त्या नटांच्या इतक्या ‘बॉडी’ने आणि त्या ‘सोल’ने फुललेली असते तिथे रिप्लेसमेंट शक्य नसते. विशाखाची रिप्लेसमेंट आम्हाला शक्य नाही. तिने ती अजरामर केलेली कॅरेक्टर आहेत किंवा समीरचीही रिप्लेसमेंट शक्य नाही. आमच्यापैकी कुणाचीच रिप्लेसमेंट शक्य नाही. अशा वेळी तुम्ही वेगळ्या पद्धतीने लोकांची ती भूक भागवू शकता. आमच्या ६० टक्के स्किटमध्ये समीरला कुणी तरी त्रास देतंय, असा एकच फॉरमॅट होता. त्या वेळी ही कल्पना मग जास्त अधोरेखित झाली. असा एक निवेदक आपण आणायचा पण वेगळ्या फॉरमॅटमध्ये. तो आता सेट झालाय. त्याचं अस्तित्व त्यानं तयार केलंय. चुकूनही तुम्हाला ‘जाऊ या गप्पांच्या गावा’ची रिप्लेसमेंट वाटणार नाही इतकं स्वतंत्रपणे. त्याच्या गरजेप्रमाणे पण असतं कधी कधी. एखादी सीरीज काही अडचणींमुळे जर थांबली असेल तर त्या सीरीजची भूक आपण दुसऱ्या माध्यमातून भागवू शकतो का? ती एक गरज असते व त्याचा तो परिणाम असतो.

श्रीपाद ब्रह्मे : ‘हास्यजत्रा’तील अनेक कलाकारांशी आम्ही बोललो. तुमच्या दोघांच्याबद्दल सगळे खूपच भरभरून बोलत होते. तुम्ही त्यांना कसं घडवलं किंवा तुमच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतो, असं ते सांगत होते. तुम्ही जेव्हा दिग्दर्शन करता त्या वेळी या सर्व कलाकारांचं कॅरेक्टर डेव्हलप करणं किंवा त्याच्यामध्ये एखादी लकब देणं असो; या सर्वांचं श्रेय  दिग्दर्शक म्हणून तुमच्या एकट्याचंच असतं की सामूहिक विचार-विनिमयातून येतं?

सचिन गोस्वामी : नाही नाही. शेवटी एकत्रच सगळ्या गोष्टी होतात. कसं होतं ना की कुठल्या गावाला जायचं हे एकदा ठरवलेलं असलं, की ड्रायव्हर-कंडक्टरच्या हातात बसचा प्रवास असतो. मग त्याने कुठल्या मॉलला किती वेळ थांबायचं हे तो ठरवतो. गाडीचा वेग काय असला पाहिजे, हे तो ठरवतो. मध्ये कुणाला जर स्टेशन नसतानाही उतरायचे असेल तर उतरू द्यायचे का नाही हेही तो ठरवतो. तसं आम्ही ड्रायव्हर-कंडक्टर आहोत. 

सचिन मोटे : सचिनचे कसे आहे, की तो दिग्दर्शन करताना त्या कलाकाराचेच ॲसेट वापरून त्याला कॅरेक्टर देतो. म्हणजे ओंकार भोजने काय करू शकेल तर त्याला तसं पॅकेज देतो. त्यामुळे ओंकार भोजनेचं काय होतं त्याला जे दिलं गेलेलं असेल त्याला ते सूट होतं. म्हणून मग तो त्याच्यात अजून स्वतःच्या चार गोष्टी पण घालू शकतो. त्याला मॅच न होणारं जर काही त्याला आलं ना, तर कदाचित त्याची धांदल उडेल. पद्धतच आमची बऱ्याचदा अशी असते, की त्याच्या त्याच्या शक्यता बघूनच त्यांना काम दिलं जातं. म्हणून मग तेसुद्धा त्याच्यात इम्प्रोवाइज करतात. कधी कधी असं असतं, की याने दिलेली एक गोष्ट असेल मग त्याच्यात कलाकाराला दुसरी, मग त्या दोन्हींत प्रत्यक्ष करताना आणखी दोन नवीन गोष्टी ॲड होतात. मग लेखक लिहिताना स्वतःकडून अजून एक काही तरी टाकतात. 

सचिन गोस्वामी : एक कॅरेक्टर तयार होतं ना, तेव्हाच त्याच्या काही लकबी तयार होतात. तेव्हा त्या लेखकांसाठी एक आउटलाइन तयार होते. पुढच्या वेळी ते पुन्हा ते बघावं लागत नाही. ती पात्रं ती वैशिष्ट्यं घेऊनच लिहिली जातात. मग कलाकाराची ती ‘प्रॉपर्टी’ झाली, की तो ती जीवापाड जपतो. मुळात ही कलाकारांची क्षमता आहे म्हणूनच आपण त्यांना काही तरी सांगू शकतो. ही कोणाकडूनही करून घेण्यासारखी गोष्ट नाही. दिग्दर्शक म्हणून किंवा लेखक म्हणून आम्ही दोघेही या सगळ्या व्यापांच्या बाहेर आहोत म्हणून तटस्थपणे बघू शकतो. नटांचं काय असते की तो ज्या वेळी रंगमंचावर असतो तो जेव्हा त्या संहितेच्या संस्करणासाठी बसतो, तेव्हा तो त्याचं म्हणून एक विश्व असल्यामुळे तो त्या दृष्टीनेच सगळ्या गोष्टींकडे पाहतो. आमचं तिथे काहीच नसल्यामुळे आम्ही तटस्थपणे त्या सगळ्यांकडे पाहतो. त्यामुळे दिग्दर्शक मग तो मी असो की कोणी असो; त्याला त्याचं सगळे चित्र स्पष्ट दिसत असतं. तो जास्त स्वच्छपणे काम करतो. नट स्वतः दिग्दर्शक असेल तर त्याला तेवढं जमत नाही. कारण तो रंगमंचावर असतो आणि तो त्याच्या पंचेसच्या पलीकडे उरलेलं वाटत असतो. त्याच्या वाटण्याला मर्यादा आहेत. आमच्या वाटण्याला काही मर्यादाच नाहीत; कारण आम्हाला हे सगळं तुमच्यात वाटायचं आहे, हे ठरलेलं असतं. त्यामुळे हे जेवढं आमचं क्रेडिट आहे ना तेवढं नटांचंही आहे. नटांमध्ये ती क्षमता आहे, कमी वेळात दिलेल्या गोष्टी करण्याची, म्हणून तर त्याला ते दिलं जातं. नाही तर ते शक्य नाही.

श्रीपाद ब्रह्मे : लेखक म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो, की आत्ताचा काळ आज जो आपण बघतो आहोत तो अतिशय संवेदनशील आहे. समाजात थोडीशी असहिष्णुता पण वाढली आहे. थोड्याशा कारणाने अमुक एक नाराज होतात. तमुकांना असं वाटते की हा आमचा अपमान झालाय. अमुक एका समाजघटकाला वाटते की हे आमच्यावर का लिहिले आहे? थोडक्यात म्हणजे वेगळ्या प्रकारची अप्रत्यक्ष दबाव खूप निर्माण होतो. यापूर्वीही टीव्हीवर सादर झालेल्या कार्यक्रमांना अनेकदा रोषाला सामोरे जावे लागले आहे. ते चांगले का वाईट यामध्ये जायला नको, पण आत्ताची परिस्थिती अशी दिसते. त्यामुळे मग लेखक म्हणून तुमच्यावर खूप मर्यादा येतात असे तुम्हाला वाटते का? काही गोष्टी आता आपण करू शकत नाही म्हणून? हे जे कथित दबाव गट आहेत, कदाचित बेकायदा, पण ते प्रभावी आहेत आणि ते तुमच्यावर दबाव आणतात. त्यांना हाताळताना लेखक म्हणून खूप त्रास होतो किंवा मर्यादा येतात असं वाटतं का? कारण विनोदनिर्मितीत असं म्हटलं जातं की कॉमेडी इज अ सीरियस बिझनेस… पण तो करताना आपल्याला एवढ्या साऱ्या गोष्टींना झुंजायला लागतंय असा काही अनुभव तुम्हाला येतोय का?

सचिन मोटे : हे खरंच आहे. केवळ विनोदच नाही, तर सगळ्याच पद्धतीची कला किंवा जनतेशी संबंधित जे प्लॅटफॉर्म आहेत तिथे सगळीकडेच आज हे भान ठेवूनच काम करायला लागतं, की या गोष्टीमुळे कुणी दुखावू नये. या सगळ्याचा परिणाम विनोदावर झालाच आहे. गेल्या पंचवीस-तीस वर्षांमधला बदलत गेलेला विनोद बघताना हे जाणवतं, की यातल्या बऱ्याचशा गोष्टींवर – पूर्वी जे काही समाजातले जे घटक होते ते – मग तो इतिहास असेल, पुराण असेल किंवा राजकीय व्यक्तिमत्त्वं असतील किंव सरकारी कामकाज असेल - या सगळ्या गोष्टींवर पूर्वीचे कलाकार जितक्या निर्भीडपणे आणि खेळकरपणे व्यक्त होऊ शकायचे तेवढे आता आम्ही व्यक्त नाही होऊ शकत. आम्हाला खेळकरपणे काही व्यक्तींची नावं घेऊन तर सोडाच; पण सूचकसुद्धा व्यक्त होण्याला मर्यादा येऊ लागल्या आहेत. आम्हाला विनोदी कलाकार, लेखक म्हणून निश्चितच सतत जाणवणारा हा त्रास आहे. दुसरीकडे समाजही भित्रा होत चालला आहे आणि खूप दु:ख नको, असा समाज वाढायला लागला आहे. पूर्वी लोकांना विनोदातून दु:ख चालायचं. विनोदाने एक प्रकारची टोचणी दिलीय, बोचरा विनोद असायचा, विनोद तुम्हाला तसं काही सुनावून गेला, की लोक अंतर्मुख होऊन टाळ्या वाजवायचे, दाद द्यायचे.

श्रीपाद ब्रह्मे : तो विनोद चांगला मानला जायचा…

सचिन मोटे : चांगला मानला जायचा आणि तो चांगला असतोच. आजही चांगलाच आहे. मात्र, लोक आजकाल खूप हळवे व्हायला लागले आहेत. कोव्हिड काळात तर असं झालं, की आता याला चांगलं-वाईट नाही म्हणू शकत आपण; पण कोव्हिड काळातली परिस्थिती अशी होती की, माणसं खूप घाबरली होती. त्यांना असं वाटायचं, की तुम्ही आम्हाला काही वैचारिकही सांगू नका आणि त्रास होईल असंही काही सांगू नका. आता आम्हाला आजूबाजूनेच एवढं घाबरवलं जातं, आजूबाजूनेच एवढा त्रास आहे, की आम्हाला दोन घटका काही तरी हसवा. आम्हाला निखळ करमणूक द्या. ‘हास्यजत्रे’कडून ही डिमांड खूप वाढली. ‘हास्यजत्रे’चं नाव आज आपण पाच वर्षे घेतो, त्याच्यातील कोव्हिडची दोन वर्षे खूप मोठी आहेत. या काळात ‘हास्यजत्रे’नं अनेकांना जगवलं असं लोक आम्हाला सांगतात. याला कारणही हेच आहे की आम्ही निर्विष विनोद देण्याचा प्रयत्न केला. आमचा विनोदही असा असायचा, की तो कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना त्रासदायक वाटायचा नाही. कुठल्याच धर्माच्या माणसाला असं वाटायचं नाही, की यातून माझ्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. म्हणजे नकळत आम्हाला या कार्यक्रमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही गोष्ट पोषक ठरली; अन्यथा आम्ही जर एका वर्गाला किंवा एका गोष्टीवर जास्त बोलत राहिलो असतो तर आता जितक्या निखळ पद्धतीने आम्हाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता म्हणतो, की आम्हाला तुमचा कार्यक्रम आवडतो. आम्ही तो आवडीने बघतो, तर तसं तो म्हणू शकला नसता, आता कुठल्याही वर्गातला सामान्य माणूस म्हणतो, मग तो गरीब असो, श्रीमंत असो; गुजराती असो बंगाली असो; अशी सगळी माणसं जे म्हणतात ना, याला कारण कदाचित या सगळ्यापासून आम्ही लांब राहिल्याचा परिणाम असेल; पण तरीसुद्धा हे लांब राहणं आम्हाला खूप त्रासदायक वाटतं. कारण त्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विनोदी कलाकाराला राजकीय भाष्य करता येणं, विनोदी कलाकाराला सामाजिक भाष्य करता येणं, त्याला एखाद्या व्यक्तिरेखेचं, त्यावरचं काही कॉमिक अर्कचित्र रेखाटता येणं आणि एका वेळी कुठल्याही पातळीवरच्या नेत्यांच्या आपण तशी व्यक्तिरेखा रेखाटू शकायचो. त्याचा मोठा फटका आहे तो आम्हीच नाही तर समाजही भोगतोय. आपण सगळेच भोगतोय. आपण फक्त पुढे पुढे जात असतो म्हणून आपल्याला ते कळत नाही. आपण मागच्या कोणत्या चांगल्या गोष्टी गमावत चाललोय. त्यामुळे तुम्ही जे बोललात ते खरंच आहे. 

सचिन गोस्वामी : हे जे तुम्ही म्हणताय तसं व्यापक दृष्टीनं पाहिलं तर तसं नाहीये. म्हणजे हे जे भावना दुखावताहेत म्हणतोय त्या सरसकट सगळ्या समाजाच्या नाही दुखत. समाजाचे जे ‌‘सो कॉल्ड’ प्रतिनिधी म्हणून जे छोटे छोटे गट तयार झाले त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी त्या भावना दुखावल्या जातात हे लक्षात घेतलं पाहिजे. की एखादा विषय जर एखाद्या वर्गाला तो विनोद त्या वर्गावर टीका करणारा आहे असं कुठला एक गट सांगत असेल तर तो गट फक्त त्याच्या अस्तित्वासाठी त्याचा ‘इश्यू’ करतो. त्या वर्गाला त्या विनोदातून फक्त आनंदच मिळतो, असं मी पाहिलंय. आता सोशल नेटवर्किंगमुळे काय झालंय की सगळे ॲक्सेसेबल आहेत. म्हणजे गोस्वामी जर काही बोलला तर गोस्वामीपर्यंत पोचताच येतंय. सामान्य माणसाला या सगळ्याशी काही देणं-घेणं नाही. विनोदाने इतकं पोषण झालंय महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचं किंवा संपूर्ण सामाजाचं, की तो विनोदाला कधीच दूर करीत नाही. विनोद आणि राजकीय भान हा तर त्याच्या जगण्याचा अर्कच आहे. पण काही जे विशिष्ट गट तयार झालेत ते त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी, अस्तित्वासाठी त्याचा इश्यू करतात. कारण सरसकट समाज रस्त्यावर आलेला तुम्ही कधी पाहिलाय का एका विनोदासाठी? विशिष्ट पाच-पंचवीस लोकच झेंडे घेऊन तुमच्यापर्यंत येतात आणि ते त्या समाजाचे प्रतिनिधी म्हणून तुमच्याशी भांडत बसतात. त्यातले काही मग प्रतिक्रिया म्हणून ‘आमचा निषेध’ एवढंच म्हणतात. तर मी असं पाहिलंय की अशा प्रकरणांमध्ये त्याच वर्गातले अनेक जण ‌‘अरे हा साधा विनोद होता रे! याच्यात काही नव्हतं,’ असं म्हणणारे, भांडणारेही मी खूप पाहिलेत या अशा प्रकारच्या वादामुळे! पण यामुळे सरसकट समाजाला आपण दोष नाही देऊ शकत. सरसकट समाजच आता दूषित झालाय असं नाहीये. एका विशिष्ट वर्गाने, समाजाने त्याचा प्रतिनिधी म्हणून अत्यंत वाईट रूप आपल्यापुढे मांडलंय. खरं म्हणजे मला वातावरण खूप स्वच्छच दिसतंय.

सचिन मोटे : तू म्हणतोस ते बरोबर आहे. या मुद्द्याशी मी सहमत आहे. त्यांच्या समाजाचे जे नेते आहेत त्यांना हे हवंच आहे, की मी याच्यामुळे दुखावला गेलोय म्हणून. पण दुसरीकडे मला असं वाटतं, आता आपण बघू शकतो, की आता तुम्ही संतासिंग, बंतासिंग असं म्हणू शकत नाही. अख्खा समाज प्रभावित होतो. आता ब्रिटनमध्ये रॉयल डायल नावाचा जो लहान मुलांचा प्रचंड गाजलेला साहित्यिक आहे, त्याच्या पुस्तकांमध्ये आता फेरसंपादन चाललं आहे. त्यातील टक्कल, जाडेपणावरील विनोद आता काढून टाकत आहेत. आज समाज खूप संवेदनशील, भित्रा आणि हळवा व्हायला लागला आहे. का असा व्हायला लागला आहे, कळत नाही. मृत्यूवरचे विनोद म्हटल्यावर माणसं आता रडायला लागतात. त्यांना वाटतं आपलंच कुणी जाणार आहे म्हणून! विनोदात जो एक हेल्दीनेस होता तो कमी कमी होत चाललाय.

श्रीपाद ब्रह्मे : त्याच मुद्द्यावर मी येणार होतो. जो निरोगी समाज आपण म्हणतो की जो विनोद सहज पचवू शकतो, सहन करू शकतो आणि ऐकू शकतो आणि त्याच्यात स्वत: हसणारा समाज हा प्रगल्भ किंवा मोकळा मानला जातो. जसं एके काळी ब्रिटिश समाजाबद्दल बोललं जायचं. आता तिथली परिस्थिती आपल्याला माहीत आहे. त्याला जोडून मला तुम्हाला एक विचारायचंय. एकूण जेव्हा आपण टीव्हीसाठी काही करतो तेव्हा अर्थातच आपल्याला एवढ्या व्यापक प्रेक्षकाच्या बौद्धिक क्षमतेचा एक लसावि काढून विनोद करावा लागतो. आपण एवढ्या मोठ्या टेलिव्हिजनच्या ऑडियन्ससाठी विनोद करतोय तर त्याच्यापेक्षा चांगल्या दर्जाचा विनोद आपण देऊ शकतो लोकांना, असं तुम्हाला कधी वाटतं का?

सचिन गोस्वामी : दोन नाही तर बारा-पंधरा पायऱ्या खाली येऊन विनोद करावा लागतो. हे बघा, कसं आहे की हा इतका मोहक व्यापार आहे की याच्यातली खंत आणि याच्यातून मिळणारा प्रतिसाद याच्यात खंत बाजूला ठेवावी लागते. गणेशोत्सवातील कलावंत घडण्याची जी परंपरा होती आपल्याकडे ती नाटकातनं यायची. गणेशोत्सवात पूर्वी नाटकं सादर व्हायची. राज्य नाट्य, एकांकिका स्पर्धा या त्या पायऱ्या आहेत. त्यतून नाटकाद्वारे सामान्य माणसातल्या कलावंताला जागं करण्याची एक क्षमता होती ती गणेशोत्सवात होती. अनेक कलावंत गणेशोत्सवातून तयार झाले आहेत. आता ते संपलंय. कारण आमच्यासारखे ‘ट्वेंटी-२०’चे उपक्रम करणारी जी मंडळी आहेत त्यांनी ते नासवून टाकलंय. आता नाटकांना कोणी निमंत्रितच करीत नाहीत. आमच्याच चार जोड्या बोलावतात. ते दहा-दहा, पंधरा-पंधरा मिनिटं दोन सोफे टाकून विनोद करतात. असं दीड दोन तास केलं तरी संपून जातं. दोन तास एक पात्र जगणं, एक परिसर दोन तास उभा करणं, एक भासमान दृश्य, त्याचा परिसर आणि त्या घटनाक्रमातून असंख्य प्रेक्षकांना आपल्या बरोबरीने प्रवास करायला लावणं ही जी सगळी प्रक्रिया होती ती सगळी संपली! दहा-पंधरा मिनिटांच्या विनोदात ते सगळं संपवून टाकलंय आपण. आम्ही गंभीर स्किट्स, तर कधी हृदयद्रावक स्किट्सही करतो; पण त्याला कोणी बोलवत नाही. हे सगळं उथळ उथळ होत चाललंय. त्याला कारणीभूत आम्हीसुद्धा आहोत. मान्य केलंच पाहिजे ते, कारण आमचीच वाढ मुळात अशा अत्यंत सुदृढ अशा सांस्कृतिक परंपरेतून झाली. पण दुर्दैवाने आता ती परंपरा खंडित होतेय, त्याला आम्हीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जबाबदार आहोत. तुम्ही म्हणाल ‘हास्यजत्रा’तल्या विनोदांचं काय? तर आम्ही सतत म्हणत असतो, की माणसाची भूक मोठी की आपलं देणं मोठं आहे? हे नेमकं उन्हातान्हात, दुर्गम ठिकाणी मोर्चाला वडापावची गाडी मिळण्यासारखा प्रकार आहे. आणि मग दोन वाजता भूक लागली आहे तुम्ही कमी मिठाचा वडापाव दिला तर तो चविष्ट म्हणून खाल्लाच जातो. तशी काहीशी टेलिव्हिजनमधली आमची अवस्था आहे. हा भाग वेगळा आहे, की आम्ही जास्तीत जास्त दर्जा ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यातल्या त्यात कन्टेंट चांगला असावा याचा प्रयत्न आम्ही करतो. पण एकूण म्हणाल, तर प्रेक्षक वाढणं आणि प्रगल्भ प्रेक्षक निर्माण होणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रगल्भ प्रेक्षक निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रेक्षक संख्या कमी असते आणि प्रेक्षकसंख्या जर मोठ्या प्रमाणात वाढवायची असेल तर तेथे प्रगल्भता ही दुय्यम आहे. सध्या आम्ही त्या फेजमध्ये आहोत. कारण आम्ही मोठा प्रेक्षक तयार करतो ही त्यात जमेची बाजू आणि आनंदाची गोष्ट आहे. पण त्यात प्रगल्भता आहे का? दर्जा आहे का? तर त्याला तुम्हाला दुय्यम ठेवायला लागतं. आणि हे दुष्टचक्र आहेच. हे सगळ्याच कला, साहित्याच्या बाबतीत आहे. तुम्हाला व्यापक वाचक असेल तर लिखाणातील खोली थोडी कमी असते. तुम्हाला कल्पना आहे, की खूप जीवनविषयक गंभीर तत्त्वज्ञान सांगणारी पुस्तकं थोडी जाड असतात, वजनदार असतात आणि कमी विकली जातात, कमी वाचली जातात. जीवनाचं रंजक चित्रण करणारी छोटेखानी पुस्तकं जास्त विकली जातात. हा सगळा परिस्थितीचा भाग आहे. त्याचे त्या रहाटगाड्यातले आम्हीसुद्धा वाटेकरी आहोत.

श्रीपाद ब्रह्मे : हा ॲकॅडमिक प्रश्न होता पण व्यावहारिक यश म्हणाल तर या कार्यक्रमाचं भरपूरच महत्त्व आहे की ते दिसतंय आपल्याला.

सचिन गोस्वामी : मात्र आम्ही मुळीच भ्रमात नाही. आम्ही आता काही तरी दर्जेदार दिलं आहे, अशा भ्रमात आम्ही कधीच राहू शकत नाही. ते ते त्या त्या काळाशी संबंधित ते ते यश आणि ती ती गोष्ट आहे. दहा वर्षांनी अजून बघाल, कदाचित मीच माझे कार्यक्रम बघेन तर मला ते उथळ वाटतील. कारण यापूर्वी मी केलेले कार्यक्रम मला उथळ वाटत होते. कारण आपण पण परिस्थितीनुसार प्रगल्भ होत असू, स्वत:ची वाढ होत असेल तर आपणच केलेलं थोडं थोडं उथळ वाटणं स्वाभाविक आहे. पुढच्या प्रेक्षकांनाही वाटेल. पण आज असं आहे, की उपलब्ध रंजनामध्ये त्यातल्या त्यात बरं रंजन आम्ही देतो.

श्रीपाद ब्रह्मे : कमिटेड किंवा जास्त प्रामाणिक राहून किंवा त्या कलाकारांमधले सगळं चांगलं काढून घेणे, त्यासाठी भरपूर मेहनत घेणं, कमिटेड राहणं हे सगळे चांगले गुण दिसलेच. खरं तर आम्ही जेव्हा कलाकारांशी बोलतो त्या वेळी आम्ही जर एक लसावि काढला असेल तर तो हाच होता की तुम्ही दोघंही इथं आहात म्हणून हे सगळं चाललंय. 

सचिन गोस्वामी : यातला विनोद निर्विष आहे. द्यायचं ते बेस्ट द्यायचं आहे. रथाला कोणी तरी सारथी लागतो. आणि सारथी जागा लागतो. तो झोपायला नको.

श्रीपाद ब्रह्मे : ज्याला ‘कॅप्टन ऑफ द शिप’ म्हणतात. आम्ही प्रत्येकाची वेगवेगळी मुलाखत घेतली आहे. एकत्र नव्हती. प्रत्येकाच्या बोलण्यात हे आलं की हे दोघं आहेत म्हणून आमचं व्यवस्थित चाललंय. आम्हाला त्यांनी चांगली दिशा दिली. आमचं पात्र त्यांनीच विकसित केलं. आमच्यातलं जे काही चांगलं आहे ते त्यांनी काढून घेतलं. मी काय करू शकतो हे त्यांना बरोबर माहिती आहे. मला एक वेळ माहिती नाही; पण त्यांना माहिती आहे इतकं लोकांनी सांगितले ते मला वाटतं तुमच्या दोघांचं निखालस यश आहे आणि त्या कार्यक्रमाचंही तेच यश आहे, असं वाटतं.

सचिन गोस्वामी : या कार्यक्रमाचे मूळ यश जे आहे ते नटांचे आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमाचा कच्चा माल म्हणजे त्याची गोष्ट आहे. कन्सेप्ट्‌‍स, विविध परिसर सतत मिळणं कारण रचणं हे तर माझ्यासारख्या अजून अनेक लोक आहेत जे करू शकतील; पण सचिन आणि आमची लेखकांची टीम जे काम करते, ते मी आज ठामपणे सांगू शकतो, की असं करणारी टीम माझ्या पाहण्यात नाही आणि कदाचित महाराष्ट्रात पण नाही. इतक्या समर्पित वृत्तीने ही सगळी मंडळी काम करतात. मीसुद्धा त्या ग्रुपमध्ये असतो म्हणजे मी टीमचाच भाग आहे. पण मी प्रामाणिकपणे सांगतो, की मी बाजूला असतो म्हणजे मी ‘अप्रूव्हल’ या पातळीवरच काम करतो. एखादा विषय झाला म्हणजे ‌‘याच्यात मजा नाही' एवढंच मला म्हणायचं असतं किंवा हा विषय वर्क होईल किंवा नाही हे सांगायचं असतं. माझं फार मोठं काँट्रिब्यूशन नाही; पण ही लेखक मंडळी काम करतात, त्यांच्यात सचिनचा सगळ्यात मोठा वाटा आहे. हे मला यासाठी सांगावंसं वाटतं, कारण तो एक विशिष्ट पद्धतीचा स्टोरीटेलर आहे. विषय येतात तेव्हा त्याची जी गोष्ट तयार करणे आहे ही फार गमतीची प्रक्रिया आहे. हा एक गोष्ट रेकॉर्ड करून प्रत्येक लेखकाला देतो. त्यातून जे मुद्दे निघतात त्याचं एका संपूर्ण गोष्टीत सचिन रूपांतर करतो. लेखक व कलाकारांमध्ये ही प्रचंड मोठी क्षमता आहे आणि ती क्षमता आमच्याकडं आहे म्हणून आम्हाला कच्चा माल मिळतो आहे. म्हणून आम्ही त्याचे प्रॉडक्ट करू शकतो. नाही तर हे अशक्य आहे. आमची लेखक मंडळी आहेत म्हणून मी निश्चिंत असतो, की उद्या हे काही तरी आणून देतीलच. कच्चं-पक्कं असेल तर ठीक आहे. तिथे आमचं काही रिपीटेटिव्ह होत असेल. आम्हालाही जाणवतं ते! कारण शेवटी मेंदू आहे, परिसर तोच आहे, संचित तेवढंच आहे. मध्ये दीड-दोन महिने चॅनेल आम्हाला सोडतं म्हणून फिरतो आम्ही. चार नवीन माणसं पाहायला मिळतात, पण हे वैशिष्ट्य आहे की या सगळ्या कार्यक्रमाचे सगळ्यांत मोठे यश हे आमच्या लेखकांच्या दीड दिवसाच्या मेहनतीचं आहे. बाकी नटमंडळी, सगळी मंडळी नंतर मेहनत करतोच; पण सगळ्यात मूळ तेच आहे की बीज शुद्ध आहे म्हणून ही फळे रसाळ तयार होतात.

श्रीपाद ब्रह्मे : इथे लेखकांचा अगदीच महत्त्वाचा भाग सांगितलात. कारण लेखक शेवटी शब्दांचे धनी! मीसुद्धा थोडा लेखक असल्यामुळे अगदी सांगूच शकतो, की त्यांच्या यातना काय प्रकारच्या असतात! या लेखक व्यवसायाशी निगडित असं अक्षरधारा हे पुस्तकांचं एक दुकान आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ग्रंथ आणि त्याची विक्री यांचा ते प्रसार करत असतात. त्या अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचंय की विशेषत: सर्व जडणघडणीमध्ये आपले ग्रंथ, वाचनसंस्कृती याविषयी तुमचं म्हणणं काय आहे? या ‘अक्षरधारा’सारख्या संस्थांना हे फार गरजेचे वाटतं, की लोकांपर्यंत पुस्तक पोहोचली पाहिजेत, वाचली पाहिजेत; पण एके काळी माध्यमात तुम्ही पण आत्ता काम करत आहात, त्याचीच खूप मोठी आव्हाने आहेत. त्याच्यापुढे इंटरनेट आहे, मोबाइल आहेत, की जे लोकांना एका शरीराच्या अवयवासारखे चिकटलेले आहेत. मग या परिस्थितीत मग जर मुळात ते वाचलं गेलं नाही तर तुमच्यासारखे लेखक कसे तयार होणार? असे कार्यक्रम तरी पुन्हा कसे येणार? मुळातच ऑडिओ-व्हिडिओ मीडियमलाच शत्रू मानलं जातं तर त्याच्यात लेखक कसे येणार, ही चिंतेची गोष्ट आहे असं तुम्हाला वाटते का? 

सचिन मोटे : चिंतेची गोष्ट आहे, पण काळ जसजसा बदलतो आहे तसं तसं साहित्यसुद्धा त्याचा मार्ग शोधत चाललंय असं मी सध्या बघतोय. आता सध्या ऑडिओ बुक्स पण लोक खूप ऐकायला लागले आहेत. मराठीतल्या खूप चांगल्या चांगल्या कादंबऱ्या लोक बारा बारा तास ऐकायला लागले आहेत. माध्यम बदलत चाललंय.

श्रीपाद ब्रह्मे : म्हणजे ते कन्झ्युम करणं आहे. 

सचिन मोटे : हो ते कन्झ्युम करणं आहेच. मला तर असं वाटतं, की खूप वेगवेगळ्या पद्धतीने पुस्तक पोहोचवण्याचे प्रयत्न तुम्ही करताच आहात, ते जर या माध्यमाला अनुकूल होत चालले तर अधिक उपयुक्त होईल. जर आपण असं केलं की चांगल्या चांगल्या नटांनी आपल्याला आवडलेले उतारे जरी रीलमध्ये ५०-५० सेकंदांचे वाचून दाखवले, या पुस्तकातली ही दहा वाक्यं, तरीही ते चांगलं होईल. शेवटी जिकडे प्रेक्षक जातात तिकडेच कलाकार जातात आणि तिकडेच आपल्यालाही जावं लागणार. आपलं साहित्य असलं तरी त्यांच्या इथं जाऊन ते पोचवणं आपलं काम आहे. जे वृत्तपत्र आपण पूर्वी वाचत होतो त्यातले पत्रकार आता रीलवर दिसायला लागले आहे. ते आता ४० सेकंदांचा रील बनवून आपले विचार पोचवण्याचा प्रयत्न करतात.

श्रीपाद ब्रह्मे : यू-ट्यूबचे चॅनेल काढतात. लेख लिहिण्याऐवजी ते बोलून दाखवतात.

सचिन मोटे : आता वाचनाचे पेशन्स कमी होत चालले आहेत. आज ‘हास्यजत्रा’सुद्धा बारा मिनिटांचे आहे म्हणून बघतात. ४५ मिनिटांचे स्किट केले तर कदाचित विसाव्या मिनिटाला बंद होईल. लोकांचे ‘अटेन्शन स्पॅन’ कमी होत चालला आहे. त्यातूनही एक प्रेक्षकवर्ग आहे, जो आजही वाचक आहे. आज कुठल्याही ग्रंथ प्रदर्शनाला गेलो तर पुस्तक विकत घेणारे खूप लोक असतात. आता काही विशिष्ट पुस्तकं जास्त खपतात, काही खपत नाहीत; पण या ज्या पूर्वीपासूनच्या समस्या आहेत त्या आहेतच. पण आव्हानेही खूप मोठी आहेत. पण मराठी साहित्य यातून कायम पुढे पुढे जात राहिलं आहे. आपल्याला तयारी ठेवायला लागेल. भाषा बदलेल; एक वेगळीच भाषा तयार होईल. या पिढीची भाषा त्यात येईल, पण हे सगळं पुढे जाईल. 

सचिन गोस्वामी : गंमत म्हणजे, मुळातच आपली भारतीय मानसिकता वाचनाची नाहीच आहे. आपण श्रवणाने ज्ञान संपादन करणारे आहोत. कीर्तनातून शिकणारे, ओव्यांतून शिकणारे. वाचनपरंपरा ही पाश्चात्त्यांनी आणलेली आहे. लेखन ही संकल्पना त्यांच्याकडूनच आली. आपल्या रक्तातच आहे की कोणी तरी येऊन मला गोष्ट सांगा. मला वाचायला लावू नका. मला तू सांग ना गोष्ट. म्हणूनच या ऑडिओ बुक्सकडे मुले का वळायला लागली आहेत, कारण त्यांना अक्षराच्या मागे धावायचंच नाही. पूर्वीही आपला समाज कीर्तनाने समृद्ध होतच होता. बहुश्रुत असायचे लोक.

सचिन मोटे : आणि तिथून तो पुन्हा वाचनाकडे जाईल. अर्धा तास ऐकलेलं पुस्तक मी वाचायला घेईन, आता हे मी वाचून बघतो म्हणून. 

श्रीपाद ब्रह्मे : तुम्ही म्हणालात तो मुद्दा अगदी बरोबर आहे. हा फार कमी वेळा मांडला जातो. खरोखर आपला समाज हा जास्त ऐकणारा आहे आणि वाचण्याकडे जायचं म्हणजे तुम्हाला अनेक स्किल्सची गरज असते. सगळ्यात पहिला म्हणजे तुम्ही साक्षर असला पाहिजे, वाचता आलं पाहिजे आणि ऐकायला काही बंधन नाही ते तुम्ही तसे कन्झ्युम करू शकता. 

सचिन गोस्वामी : आजी आपल्याला अशी गोष्ट सांगत नाही ना की हा होता श्रावणबाळ. आजी मांडीवर झोपवते आणि ती तिच्या भाषेत श्रावणबाळ सांगते. आमच्यावर संस्कारच ते आहेत.

श्रीपाद ब्रह्मे : म्हणजे आता आपण असे म्हणू शकतो, की वाचनाची संस्कृती वाढण्यासाठी ऐकण्याची संस्कृती वाढली पाहिजे. तिच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. आधी तुम्ही हे त्यांना ऐकवा आणि मग ते पुन्हा वाचनाकडे जातील.

सचिन गोस्वामी : अजूनही गाडीने जाताना मी गाणी ऐकण्याऐवजी श्रुतिका ऐकतो ती काही मिनिटं असतील, एक-दीड मिनिटाच्या लव्ह स्टोरीपासून ती काहीही असेल, बडबड चाललेली बरं वाटत असतं ऐकायला ही आपली मानसिकता आहे. 

श्रीपाद ब्रह्मे : वा खूप चांगला संवाद झाला आहे. मला असं वाटतं, की खूप वेळ आपण या दोघांबरोबर बोलू शकतो. पण वेळेची मर्यादा आहे. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या दोघांनाही मी धन्यवाद देतो. त्यांनी ‘अक्षरधारा’साठी ‘हास्यजत्रा’च्या निर्मितीची चांगली माहिती आम्हाला दिली... सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा.

धन्यवाद !

----

भाग २ मध्ये समीर चौघुलेची मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

---------------


27 Feb 2024

आपले छंद दिवाळी अंक २३ - लेख

नातं रूपेरी पडद्याशी...
---------------------------


रूपेरी पडद्यावर रंगणारी अनेक नाती आपण पाहतोच; पण ती पाहत असताना त्या रूपेरी पडद्याशीच आपले वेगळे भावबंध तयार होतात. आपल्या आयुष्यातील कधीही पूर्ण न होणारी रंगीत स्वप्नं दाखवणारा सिनेमा आणि हे सगळं जिथं घडतं ते सिनेमा थिएटर यांच्याशी आपलं अनोखं नातं जडतं. हे नातं मात्र ‘फिल्मी’ किंवा खोटं खोटं नसतं, कारण त्याला आपल्या संवेदनांची, भावभावनांची, मनोज्ञ आठवणींची पटकथा जोडलेली असते...

....

आपल्या आयुष्यात जन्माला आल्यापासून आपण वेगवेगळ्या नात्यांमध्ये बांधले जातो ते थेट शेवटचा श्वास घेईपर्यंत! हे नातं जसं जैविक असतं, तसंच भावनिक किंवा अशारीरही असतं. ते एखाद्या व्यक्तीसोबत असतं, तसंच एखाद्या वास्तूशी, स्थळाशी, पुस्तकाशी, कलाकृतीशी, एखाद्या वस्तूशी... इतकंच काय, आठवणींसोबतही असू शकतं. नात्यांचंही एखाद्या व्यक्तीसारखंच असतं. नात्याला जन्म असतो, तसाच मृत्यूही असतो. नात्याचीही वाढ होते, विकास होतो आणि नातं आजारीही पडू शकतं. नात्याची गंमत ही, ती ते निर्माण करणाऱ्याच्या आठवणीत ते कायम राहतंच! एकोणिसाव्या शतकात सिनेमाच्या कलेचा उदय झाला आणि त्यासोबतच जन्म झाला सिनेमा दाखविणाऱ्या वास्तूचा - सिनेमा थिएटरचा! या सिनेमा थिएटरशी नातं जडलं नाही, असा माणूस आपल्या भारतात सापडणं कठीण. अगदी कितीही विपरीत परिस्थितीत राहणारा असो, पण प्रत्येकाने कधी ना कधी सिनेमा थिएटरमध्ये सिनेमा बघितलेलाच असतो. एखाद्या ठिकाणी आपण वारंवार जातो, तेव्हा आपलं त्या वास्तूसोबतही नातं जडतं. उदाहरणार्थ, आपल्या घराप्रमाणेच आपली शाळा, आपला वर्ग, आपलं आवडीचं हॉटेल, तिथली आपली आवडती जागा, आपलं कॉलेज, आपली बाइक, आपली नेहमीची बस किंवा लोकल, तिथली आपली नेहमी बसायची जागा, आपलं दुकान, आपलं मंदिर किंवा प्रार्थनास्थळ, आपलं आवडतं पर्यटनस्थळ... अशा अक्षरश: कुठल्याही वस्तूसोबत आपलं नातं जडत असतं. सिनेमा थिएटरसोबत माझं असंच नातं जडलं. या लेखाच्या निमित्तानं या खास नात्याला उजाळा देण्याचा हा प्रयत्न.
मी पहिल्यांदा कोणतं थिएटर बघितलं असेल, तर ती होती आमच्या गावातली टुरिंग टॉकीज. तो साधारण १९८० चा काळ होता. आमच्या तालुक्याचं ठिकाण असलेल्या गावी एकच टुरिंग टॉकीज असल्यानं जो कुठला सिनेमा तिथं लागेल तो बघण्याशिवाय दुसरा पर्याय नसायचा. त्या टॉकीजचं नाव एका आठवड्याला ‘दत्त’ असं असायचं, तर एका आठवड्याला ‘श्री दत्त’ किंवा असंच काही तरी! त्या टॉकीजचा परवाना ‘टुरिंग टॉकीज’चा असल्यामुळं त्याला हे प्रकार करावे लागायचे. याचं कारण एकाच ठिकाणी व्यवसाय करण्याचा मुळी तो परवानाच नव्हता. त्यानं गावोगावी फिरून (टुरिंग) सिनेमा दाखवणं अपेक्षित असायचं. अर्थात हे झालं कागदोपत्री. प्रत्यक्षात ती टॉकीज एकाच जागी स्थिर असायची. ते ओपन थिएटर असल्यानं तिथं फक्त रात्री एकच खेळ व्हायचा. साधारण साडेनऊच्या सुमारास सिनेमा सुरू होत असे आणि बाराच्या आसपास संपत असे. नऊ वाजल्यापासून तिथल्या लाउडस्पीकरवर सिनेमाची गाणी (तेव्हा जो कुठला नवा असेल तो) वाजविली जात. माझ्या पहिल्या-वहिल्या आठवणींनुसार, तेव्हा ‘एक दुजे के लिए’ नुकताच प्रदर्शित झाला होता. त्याची गाणी तेव्हा तुफान गाजत होती. त्यामुळं त्या टॉकीजवर कायम हीच गाणी लागलेली असत. ‘सोलह बरस की बाली उमर को सलाम...’ हे लतादीदींचं गाणं ऐकलं, की आजही मला त्या गावातल्या थिएटरची आठवण येते. गाव अगदी लहान. त्यामुळं आठ-साडेआठनंतर सगळीकडं सामसूम होत असे. त्यामुळं ही लाउडस्पीकरवर लावलेली गाणी दूरपर्यंत ऐकू येत. अगदी आमच्या घरातही स्वच्छ ऐकू येत. साधारण नऊ वाजून २५ मिनिटांनी तो टॉकीजवाला सिनेमातली गाणी संपवून सनई लावत असे. ही एक प्रकारची तिसरी बेल असायची. गावातून कुठूनही पाच मिनिटांत थिएटर गाठता येत असे. त्यामुळं सनई सुरू झाली, की लोक कपडे वगैरे करून थिएटरकडे चालायला लागत. मला कुठल्याही परिस्थितीत सिनेमाची सुरुवात चुकवायची नसे. त्यामुळं सिनेमाची गाणी वाजत असतानाच तिथं जायचा माझा हट्ट असे. गाव लहान असलं, तरी तिथंही ‘रात्रीचं जग’ होतंच. सिनेमाच्या जवळच एक-दोन बार होते. काही हॉटेलं होती. समोरच बस स्टँड होतं. त्यामुळं पानटपऱ्या असायच्याच. एरवी त्या रात्रीच्या वेळी नुसतं तिकडं फिरकायला आम्हाला परवानगी नव्हती आणि आमची तेवढी हिंमतही नव्हती. मात्र, सिनेमाला जाताना आपल्याच गावातलं हे पेट्रोमॅक्सच्या बत्तीच्या प्रकाशातलं वेगळं जग थोडा वेळ तरी बघायला मिळे. दिवसा कधीही न दिसणारी माणसं तिथं दिसत. आणि दिवसा दिसणारी माणसं चुकूनमाकून दिसलीच तरी ती त्या पिवळसर प्रकाशात वेगळीच कुणी तरी भासत. पुढं आम्ही प्रवेश करणार असलेल्या आभासी जगाचा हा ट्रेलरच असायचा जणू! माझे वडील एसटीत असल्यानं ‘एसटी साहेबां’ची मुलं म्हणून आम्हाला तिथं भाव असायचा. माझ्या माहितीप्रमाणे, तेव्हा दोन रुपये तिकीट असायचं. आम्ही कधीही रांगेत वगैरे उभं राहून ही तिकिटं काढली नाहीत. आम्हाला थेट आत प्रवेश मिळायचा. आत वाळूवर खाली बसूनच सिनेमा बघायचा. एका बाजूला बायका आणि एका बाजूला गडीमाणसं. मध्ये अगदी दोन-अडीच फूट उंचीची छोटीशी भिंत घातली होती. बायकांची संख्या मुळात फारशी नसायचीच. त्या आल्या, तरी ग्रुपने यायच्या. एकटी-दुकटी बाई तिथं दिसणं कठीण. सगळे गावातलेच लोक असल्याने ओळखीचं कुणी ना कुणी असायचंच. त्यामुळं एकट्यानं कधी तिथं जाण्याची शामत नव्हती. शिवाय ‘कुटुंबासोबत पाहण्याचे’ सिनेमेच बघायला आम्हाला तिथं नेलं जात असे, हे उघड आहे. आम्ही एसटी साहेबांचं कुटुंब म्हणून आम्हाला सगळ्यांत शेवटी बाकडी टाकली जात. त्या बाकांच्या बरोबर मागे प्रोजेक्टर रूम होती. मला त्या खोलीच्या आत जायची भयंकर उत्सुकता असे. मी अनेकदा त्या दारात जाऊन आत डोकावून बघतही असे. पुढं बाकांवर त्या रिळांचा ‘टर्रर्रर्र’ असा बारीक आवाजही सतत येत असे. अनेकदा रिळं बदलावी लागत. मग त्या वेळी दोन मिनिटांसाठी सिनेमा थांबे. तेवढ्यात बाहेर जाऊन बिड्या मारून येणारे लोक होते. सिनेमाला रीतसर मध्यंतर होई. मात्र, आम्हाला बाहेर जाऊन तिथलं काही खायची परवानगी नसे. अगदी चहाही नाही. त्यामुळं तिथं बाहेर नक्की काय विकत, याचा मला आजतागायत पत्ता नाही. ही ओपन एअर टॉकीज असल्यानं वारा आला, की पडदा वर-खाली हाले. त्यामुळं निळू फुले, अशोक सराफ, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा आदी मंडळी ब्रेकडान्स केल्यासारखी हलत-बोलत. मात्र, सिनेमा बघण्याच्या आनंदापुढं त्याचं काही वाटत नसे. पडद्याच्या मागं मोठा लाउडस्पीकर लावलेला असे. मी तिथंही जाऊन वाकून वाकून, आवाज कुठून येतो हे बघत बसे.
कालांतराने गावात अजून एक टॉकीज झाली. ती ज्या माणसाने सुरू केली, त्याने स्वत:चंच नाव तिला दिलं होतं. त्यामुळं ही टॉकीज ‘अरोरा टॉकीज’ म्हणूनच ओळखली जात असे. ही जरा घरापासून लांब होती. मात्र, इथं पक्क्या भिंती होत्या. वर ओपन असलं, तरी पडदा मोठा होता आणि खुर्च्यांच्या दोन रांगाही होत्या. तिकीट आता जरा वाढलं होतं. इथं पाच रुपये घ्यायचे. तरी काही चांगले सिनेमे आले तर आम्ही नक्की जायचो. एकदा एक कुठला तरी चांगला सिनेमा आला, म्हणून बघायला गेलो, तर ऐन वेळी ‘रॉकी’ हा संजय दत्तचा पहिला सिनेमा बघावा लागल्याच्या दुःखद आठवणीही याच थिएटरमधल्या. ‘अनोखा बंधन’ हा शबाना आझमी अभिनित, त्या दोन छोट्या मुलांचा आणि त्यांच्या लाडक्या बोकडाचा सिनेमाही इथंच बघितल्याचं आठवतंय. त्यानंतर लवकरच व्हिडिओचा जमाना सुरू झाला आणि टॉकीजचं महत्त्व कमी व्हायला लागलं. मुळात तेव्हा मोठ्या शहरात प्रदर्शित झालेले सिनेमे गावात लगेच येत नसत. दोन-तीन महिन्यांनी ते लागत. त्याउलट व्हिडिओ पार्लरवाले लगेचच नवा सिनेमा दाखवत. (आता लक्षात येतंय, की त्यांच्याकडे पायरेटेड कॉपी असणार...) हे व्हिडिओ पार्लर गावात मध्यवर्ती ठिकाणी, एखाद्या छोट्या हॉलमध्ये असत. तिथे दुपारीही सिनेमा बघता येई. तोवर आम्हाला फक्त रात्री साडेनऊचाच सिनेमा बघायची सवय होती. एक रंगीत टीव्ही आणि एक व्हीसीआर या भांडवलावर तेव्हा अनेकांनी व्हिडिओ पार्लर सुरू केले होते. या पार्लरमध्ये सिनेमाला एक रुपया तिकीट असे. तेव्हा थिएटरला दोन ते पाच रुपये लागत असताना एक रुपयात सिनेमा बघायला मिळणं ही मोठीच गोष्ट होती. मी ‘मरते दम तक’ नावाचा, राजकुमारचा एक सिनेमा अशा व्हिडिओ पार्लरमध्ये, सुट्टीत आमच्याकडं आलेल्या माझ्या लहान आत्येभावासोबत बघितला होता. याच पार्लरमध्ये मी ‘शोले’ पहिल्यांदा बघितला. लहान पडदा असला तरी त्या सिनेमाचा मोठा प्रभाव पडल्याचं मला आजही चांगलं आठवतं. विशेषत: त्या सिनेमाचं पार्श्वसंगीत विशेष लक्षात राहिलं होतं. नंतर आमच्या गावात बंदिस्त थिएटर झालं. चार चार खेळ व्हायला लागले. मात्र, तोवर मी गाव सोडलेलं असल्यानं तिथं जाण्याचा योग काही आलाच नाही.
पुढं आठवीत गेल्यानंतर मी कुटुंबासह नगरमध्ये आलो. हे जिल्ह्याचं ठिकाण. त्यामुळं इथं बंदिस्त थिएटर्स होती. तेव्हा नगरमध्ये सहा थिएटर होती. पूर्वी ‘बालशिवाजी’ हा सिनेमा बघायला आम्हाला गावावरून इथं आणण्यात आलं होतं. तेव्हा अप्सरा नावाच्या थिएटरमध्ये हा सिनेमा बघितल्याचं आठवतं. नंतर या टॉकीजचं नाव शिवम प्लाझा असं झालं. तेव्हा नगरमध्ये आशा, चित्रा, छाया, दीपाली, अप्सरा (शिवम प्लाझा) आणि महेश अशी सहा थिएटर होती. यात सगळ्यांत नवं झालेलं होतं ते महेश थिएटर. हे माझं सर्वांत आवडतं थिएटर होतं. तेव्हा नगरमध्येच काय, पुण्यातही एवढं भव्य थिएटर मी तोवर बघितलं नव्हतं. जवळपास आठशे ते नऊशे लोकांची क्षमता असलेलं हे थिएटर सुंदर बांधलं होतं. याची बाल्कनी अतिशय मोठी होती. एका रांगेत जवळपास ३५-४० खुर्च्या होत्या आणि एकूण बाल्कनीतच ३००-४०० लोक बसू शकत. वर उत्कृष्ट फॉल सीलिंग होतं आणि त्यात पिवळसर दिवे बसवले होते. प्रत्येक वेळी सिनेमा सुरू होताना मरून रंगाचा मखमली पडदा वर जात असे. ७० एमएमचा भव्य पडदा होता. या थिएटरला तेव्हा १५ व २० रुपये तिकीट होतं. मी अनेकदा मॅटिनी शो बघायला एकटा जात असे. आमच्या घरापासून सायकलवरून इथं यायचं आणि एकट्यानं मॅटिनीचा शो बघायचा, असं मी अनेकदा केलं. विशेषत: अमिताभचे बहुतेक सर्व सिनेमे री-रनसाठी इथं मॅटिनीला लागायचे. जंजीर, दीवार, शोले, अमर अकबर अँथनी, मुकद्दर का सिकंदर, त्रिशूल असे सर्व महत्त्वाचे सिनेमे मला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले, ते केवळ महेश थिएटरमुळे. अलीकडे कोव्हिडमध्ये बहुतांश सिंगल स्क्रीन थिएटर बंद पडली, त्यात हे सुंदर थिएटरही बंद पडल्याचं कळलं तेव्हा मला अतोनात दु:ख झालं.
नगरमध्ये ‘आशा’ हे मध्यवर्ती भागातलं एक चांगलं थिएटर होतं. आकारानं लहान असलं, तरी शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यानं तिथं कायम गर्दी असायची. या टॉकीजला कायम ब्लॅकनं तिकिटं विकली जायची. तिकीट खिडकीसमोर त्यांनी एक बंदिस्त आणि एकामागे एक असं एकच माणूस उभं राहू शकेल, असा कॉरिडॉर बांधला होता. प्रचंड गर्दी असली, की तिथं शिरायला भीती वाटायची. शिवाय आत उभं राहिलं तरी तिकीट मिळेल याची कुठलीही खात्री नसायची. सुरुवातीला ब्लॅकवाल्याचीच मुलं उभी असायची. त्यांना तिकिटं दिली, की तो माणूस बुकिंग विंडो बंद करून टाकायचा. तेव्हा राम-लखन, चांदनी, किशन-कन्हैया असे एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे मी या थिएटरला बघितले. मात्र, दहा रुपयांचं तिकीट थेट ४० रुपयांना ब्लॅकमध्ये मिळायचं. मी एखादेवेळी घेतलंही असेल; मात्र, शक्यतो घरी परत जाण्याकडं माझा कल असायचा. नंतर गर्दी ओसरल्यावर मग जाऊन मी तो सिनेमा बघत असे. ‘माहेरची साडी’ हा सिनेमा याच थिएटरला विक्रमी चालला होता. नंतर मणिरत्नमचा गाजलेला ‘बॉम्बे’ही मी इथंच बघितला. आमच्या शाळेसमोर ‘चित्रा’ नावाची टॉकीज होती. इथं मी ‘तेजाब’, सचिन व अशोक सराफचा ‘भुताचा भाऊ’ यांसह अनेक सिनेमे बघितले. मात्र, या टॉकीजलगतच्या गल्लीत (तिला चित्रा गल्ली असंच म्हणत) वेश्यावस्ती होती. त्यामुळं शाळेतून आमच्यावर अनेक शिक्षकांची कडक नजर असे. शाळा चुकवून कोणी त्या थिएटरला जात नाही ना, हे बघितलं जाई. चित्रा टॉकीज अगदी छोटी होती आणि तिथं तीन रुपये खाली आणि चार रुपये बाल्कनी असे तिकीट दर असायचे. तिथंही भरपूर मारामारी व्हायची आणि ब्लॅकचा धंदा चालायचा. नगरच्या प्रसिद्ध अशा चितळे रोडवर अगदी मध्यवर्ती भागात छाया टॉकीज होती. खरं म्हणजे ते एक गोडाउन होतं. त्या टॉकीजला बाल्कनी अशी नव्हतीच. दोन रांगा मागे जरा उंचीवर होत्या. लगेच एक लाकडी कठडा आणि समोर ड्रेस सर्कल. या टॉकीजमध्ये मी फारसा कधी गेलो नाही. पूर्वीचं हे बागडे थिएटर आणि तिथं नाटकं वगैरे होत, असं नंतर कळलं. मात्र, मी नगरमध्ये होतो तेव्हा तिथं ही छाया टॉकीजच होती.
नगरच्या झेंडीगेट भागात दीपाली टॉकीज होती. भव्यतेच्या बाबतीत महेशच्या खालोखाल मला ही दीपाली टॉकीज आवडायची. दहावीची परीक्षा दुपारी दोन वाजता संपल्यावर घरी न जाता, मित्रांसोबत या टॉकीजला येऊन आम्ही संजय दत्तचा ‘फतेह’ नावाचा अतिटुकार सिनेमा बघितला होता. मुळात सिनेमा कोणता, याच्याशी आम्हाला देणं-घेणं नव्हतंच. दहावीची परीक्षा संपली याचा आनंद आम्हाला साजरा करायचा होता. याच टॉकीजला मी ‘मैंने प्यार किया’ आणि ‘हम आप के हैं कौन?’ हे दोन सुपरडुपर हिट सिनेमे बघितले. त्या काळात या टॉकीजलाही कायम तिकिटं ब्लॅक व्हायची. या टॉकीजचं पूर्वीचं नाव सरोष टॉकीज असं होतं. तिथल्या कँटीनला सरोष कँटीन म्हणूनच ओळखलं जायचं. पुण्यात ‘लकी’ किंवा ‘गुडलक’ किंवा ‘नाझ’विषयी हळवं होऊन बोलणारे खवय्ये आहेत, तसेच एके काळी नगरमध्ये ‘सरोष कँटीन’ची आणि तिथल्या इराणी पदार्थांची क्रेझ होती म्हणे. मला मात्र कधी तिथल्या कँटीनला जाण्याचा आणि काही खाण्याचा योग काही आला नाही.
मी दहावी झाल्यानंतर नगर सोडलं आणि १९९१ मध्ये डिप्लोमा इंजिनीअरिंगसाठी पुण्यात आलो. पुण्यात आल्यावर विविध थिएटर्सचं अनोखं आणि विशाल जग माझ्यासाठी खुलं झालं. खरं तर पुण्यात राहायला येण्यापूर्वीच मी पुण्यातली काही थिएटर बघितली होती. याचं कारण आत्याकडे मे महिन्याच्या सुट्टीत येणं व्हायचं. तेव्हा मोठ्या आत्येभावासोबत अनेक सिनेमे पाहिले. तेव्हा पुण्यात मंगला, राहुल, अलंकार, नीलायम, अलका, प्रभात आणि लक्ष्मीनारायण ही सर्वांत प्रमुख आणि मोठी चित्रपटगृहे होती. सुट्ट्यांमधल्या सिनेमांची सर्वांत ठळक आठवण ‘अलंकार’ला बघितलेल्या श्रीदेवीच्या ‘नगीना’ या सिनेमाची आहे. यासोबतच ‘मंगला’ला तेव्हा अतिशय चर्चेत असलेल्या ‘छोटा चेतन’ या पहिल्या थ्री-डी सिनेमाचीही आठवण अगदी ठळक आहे. पहिल्यांदाच तो गॉगल घालून तो सिनेमा बघितला होता. त्यातला तो पुढ्यात येणारा आइस्क्रीमचा कोन, त्या भगतानं उगारलेला त्रिशूळ थेट अंगावर येणं असले अचाट प्रकार बघून १२ वर्षांचा मी भलताच थक्क झालो होतो. त्याही आधी काही वर्षांपूर्वी ‘अष्टविनायक’ हा चित्रपट ‘प्रभात’ला मी कुटुंबीयांसोबत बघितल्याची आठवण माझी आई सांगते. मला मात्र या सिनेमाची कुठलीही आठवण नाही. पुढं ‘प्रभात’ या चित्रपटगृहाशी आपलं फार जवळचं आणि जिव्हाळ्याचं नातं जडणार आहे हे तेव्हा कुठं ठाऊक होतं?
त्याआधी १९९१ मध्ये गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतला, तेव्हा आम्हाला सर्वांत जवळचं थिएटर म्हणजे ‘राहुल - ७० एमएम’. पुण्यातलं पहिलं ७० एमएम थिएटर. आमच्या कॉलेजपासून गणेशखिंड रोडने कृषी महाविद्यालयाच्या चौकापर्यंत उतार होता. सायकलला दोन-चार पायडल मारली, की थेट त्या चौकापर्यंत सायकल जायची. आम्ही अनेकदा ‘राहुल’ला जायचो. तेव्हा तिथं फक्त इंग्लिश सिनेमे असायचे. त्यातले अनेक ‘फक्त प्रौढांसाठी’ असायचे. आम्ही १६-१७ वर्षांची मुलं अगदीच लहान दिसायचो. त्यामुळं डोअरकीपर आम्हाला सोडायचा नाही. कधी चुकून सोडलंच तर तो सिनेमा बघायचा. नाही तर तिकिटं कुणाला तरी विकून पुढच्या थिएटरला निघायचं, असा कार्यक्रम असायचा. एकदा आम्ही ‘अलका’ला ‘घोस्ट’ सिनेमा बघायला गेलो. तिथल्या डोअरकीपरला मला आणि माझ्या मित्राला आत सोडलं नाही. तेव्हापासून तो सिनेमा बघायचा जो राहिला तो राहिलाच. अगदी अलीकडं ‘ओटीटी’वर बघितला, तेव्हा खूप दिवसांचं ऋण फिटल्याची भावना मनात आली. पुढं खरेखुरे ‘ॲडल्ट’ झाल्यावर ‘राहुल’ आणि ‘अलका’च्या भरपूर वाऱ्या केल्या, हे सांगणे न लगे!

पुढं १९९७ मध्ये मी ‘सकाळ’मध्ये रुजू झालो, तेव्हा आमच्या ऑफिसपासून सर्वांत जवळचं थिएटर होतं ते म्हणजे प्रभात! तिथं कायम मराठी सिनेमे लागायचे. ‘मराठी सिनेमांचं माहेरघर’ असा उल्लेख तेव्हा महाराष्ट्रात दोन थिएटरच्या बाबतीत केला जात असे. एक म्हणजे ‘प्रभात’ आणि दुसरं म्हणजे दादरचं शांतारामांचं ‘प्लाझा’! (या प्लाझात एखादा सिनेमा बघायची माझी इच्छा आजही अपुरीच आहे...) असो. तर त्या उमेदवारीच्या काळात मी ‘प्रभात’ला जवळपास येतील ते सर्व सिनेमे पाहिले. पुढे ‘सकाळ’मध्ये मी चित्रपट परीक्षणं लिहू लागल्यावर तर ‘प्रभात’ला दर आठवड्याला जाणं हे अपरिहार्य झालं. माझ्या जर्नालिझमच्या वर्षात आम्हाला एक प्रोजेक्ट होता. त्यात वेगळ्या, हट के क्षेत्रातील व्यक्तीची मुलाखत घ्यायची होती. मी ‘प्रभात’चे तेव्हाचे डोअरकीपर मेहेंदळेकाका यांची मुलाखत घेतली. ‘प्रभातनगरीचा द्वारपाल’ असं त्याचं शीर्षक होतं, हे मला आजही आठवतं. आमच्या त्या ‘वृत्तविद्या’ या विद्यार्थी वृत्तपत्राचा अंकही मी काकांना आवर्जून नेऊन दिला होता. तेव्हापासून ‘प्रभात’मधल्या या काकांशी आणि नंतर इतर स्टाफशीही चांगली गट्टी जमली. भिडेकाका हे मॅनेजर होते. ते एरवी अतिशय कडक होते. गैर वागणाऱ्यांना, बायका-मुलींची छेड काढणाऱ्या आगाऊ मुलांना ते काठीनेही मारायला कमी करायचे नाहीत. मात्र, माझे आणि त्यांचे संबंध अतिशय स्नेहाचे होते. मला नंतर ‘प्रभात’मध्ये कायमच घरचा सदस्य असल्यासारखी वागणूक मिळाली. तेथील वाघकाका यांच्याशीही स्नेह जमला. ‘प्रभात’चे मालक विवेक दामले यांच्याशी नंतर ओळख झाल्यानंतर तर मी कायम त्यांच्याकडे गप्पा मारायला जात असे. सिनेमाच्या वेळेआधी किमान एक तास आधी मी तिथं जाऊन दामलेंशी गप्पा मारत असे. त्यांच्या तीन पिढ्या प्रभात स्टुडिओच्या काळापासून या व्यवसायात असल्याने त्यांच्याकडे किश्श्यांची कमतरता अजिबात नसे. चित्रपटसृष्टीतल्या नानाविध गमतीजमती त्यांच्या तोंडून ऐकून मी अगदी हरखून जात असे. त्यांच्याकडे चहा व्हायचाच. मध्यंतरातही ऑफिसमध्ये या सगळ्यांसोबत बसूनच चहा व्हायचा. सिनेमा संपल्यावर मग तो कसा होता, प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळेल, यावर चर्चा व्हायची आणि मग मी ऑफिसला जायचो. अनेकदा रविवारी माझं परीक्षण आल्यावर (जर त्यात सिनेमाचं कौतुक असेल तर) रविवारच्या खेळांना गर्दी वाढलेली असे. स्वत: दामले किंवा भिडेकाका मला हे सांगत. मी जवळपास ११ वर्षं आधी ‘सकाळ’ व नंतर ‘मटा’त सिनेमा परीक्षणं लिहिली. त्या दहा-अकरा वर्षांत मी तीनशेहून अधिक सिनेमांवर लिहिलं. त्यात ‘प्रभात’मध्ये किती सिनेमे पाहिले असतील, याची गणतीच नाही. ‘बिनधास्त’ हा सिनेमा प्रदर्शित झाला, तेव्हा तो मला इतका आवडला, की वेगवेगळ्या १४ लोकांसोबत मी १४ वेळा तो सिनेमा त्या काळात पाहिला. दहा वर्षांपूर्वी ‘प्रभात’ने चित्रपट पुरस्कार देण्याची घोषणा केली. दोन वर्षं मोठा समारंभ करून त्यांनी हे पुरस्कार दिलेही. त्या काळात त्या चित्रपट पुरस्कार निवड समितीवर मी दोन वर्षं काम केलं. तो अनुभव फार समृद्ध करणारा होता. पुढं हे पुरस्कार बंद झाले, तरी दामलेंशी वैयक्तिक स्नेह कायम राहिला. मात्र, नंतर त्यांनी हे थिएटर मूळ मालकांना - इंदूरचे किबे यांना - करारानुसार परत केलं. (‘प्रभात’चं मूळ नाव किबे लक्ष्मी थिएटर. आता पुन्हा हेच नाव प्रचलित झाले आहे.) काय योगायोग असेल तो असेल. मात्र, मालकी बदलल्यापासून मी एकदाही पुन्हा त्या थिएटरला गेलोच नाही. मुद्दाम ठरवून असं नाही, पण नाहीच जाणं झालं. माझे आणि त्या थिएटरचे ऋणानुबंध असे अचानक संपुष्टात आले.

चाफळकर बंधूंनी पुण्यात पहिलं मल्टिप्लेस २००१ मध्ये ‘सातारा रोड सिटीप्राइड’च्या रूपात उभं केलं आणि थिएटरच्या दुनियेत एक नवं पर्व सुरू झालं. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीच देशभर भराभर मल्टिप्लेसची उभारणी होत गेली. मी सातारा रोड सिटीप्राइडला २००१ मध्ये ‘लगान’ बघितला आणि त्या अनुभवाने अगदी भारावून गेलो. नंतर त्यांनी २००६ मध्ये कोथरूडमध्ये ‘सिटीप्राइड’ उभारलं आणि माझी फार मोठी सोय झाली. मी तेव्हा वारज्यात राहत असल्यानं मला हे नवं चकाचक मल्टिप्लेक्स जवळ पण पडत असे. थोड्याच काळात ‘प्रभात’प्रमाणे इथल्याही सगळ्या स्टाफशी चांगली ओळख झाली. चाफळकरांप्रमाणेच इथं आधी हितेश गायकवाड नावाचे मॅनेजर होते, त्यांच्याशी मैत्री झाली. नंतर सुगत थोरात आले. अनिल तपस्वी, राजेश गायकवाड, अंबरीश आदी सर्व स्टाफशी खूप चांगली दोस्ती झाली आणि ती आजही कायम आहे. मी ‘प्रभात’ आणि ‘कोथरूड सिटीप्राइड’ या दोन्ही चित्रपटगृहांना माझं दुसरं घरच मानतो. पुढं २०१७ मध्ये मनस्विनी प्रभुणेनं तिच्या समदा प्रकाशनातर्फे माझ्या चित्रपटविषयक लेखनाचं ‘यक्षनगरी’ हे पुस्तक प्रकाशित केलं, तेव्हा मी ते याच दोन चित्रपटगृहांना अर्पण केलं आहे. ‘कोथरूड सिटीप्राइड’मध्ये नंतर आशियाई चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असे अनेक चित्रपट महोत्सवही भरू लागले. तेव्हाचा माहौल हा केवळ अनुभवण्यासारखाच असायचा. या महोत्सवांनी चित्रपटगृहांत सिनेमा पाहण्याचा आनंद नव्यानं उपभोगता आला, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. जागतिक पातळीवरचा, अन्य देशांतील सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहता आला तो केवळ अशा महोत्सवांमुळंच!
मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांनी भारतात सिनेमा क्षेत्रात एक नवी क्रांतीच केली, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. सिनेमा पाहण्याचा भव्य अनुभव तिथल्या आधुनिक तंत्रज्ञानामुळं प्रेक्षकांना घेता आला. उत्तम दर्जाची ध्वनिव्यवस्था, उत्कृष्ट दर्जाचे पडदे, अत्याधुनिक प्रक्षेपण यंत्रणा, वातानुकूलित यंत्रणा, आरामदायी आसनव्यवस्था यामुळं मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहणं हा एक सुखद अनुभव ठरू लागला. तिथली अवाढव्य यंत्रणा, स्वच्छ वॉशरूम आदी व्यवस्था यामुळं तिथले महागामोलाचे खाद्यपदार्थही प्रेक्षकांनी (‘कुरकुर’ करत) स्वीकारले. भारतातील प्रचंड प्रेक्षकसंख्या आणि मल्टिप्लेक्सचे वाढते स्क्रीन यामुळं चित्रपट धंद्याची यशाची गणितंही बदलून गेली. पूर्वी सिंगल स्क्रीनमध्ये रौप्यमहोत्सव, सुवर्णमहोत्सव साजरा करूनही न होणारी कमाई मल्टिप्लेक्समधल्या प्रचंड मोठ्या संख्येनं असलेल्या खेळांमुळे अवघ्या आठवडाभरात करता येऊ लागली. अर्थात, मल्टिप्लेक्सच्या भव्यपणामुळं प्रेक्षकाचा एखाद्या वास्तूशी जो वैयक्तिक ‘कनेक्ट’ होतो, तो होईलच असं काही सांगता येत नाही. एखाद्या मॉलमध्ये आपण जातो, दुकानं न्याहाळतो तशा पद्धतीनं येणारा प्रेक्षकही वाढला. माझ्याबाबत मात्र असं काही झालं नाही. ‘कोथरूड सिटीप्राइड’शी वैयक्तिक स्नेहबंध तयार झाला. तिथल्या वास्तूत घरासारखं वाटतं. ही माझी एकट्याची नाही तर तिथं नेहमी येणाऱ्या अनेकांची भावना असेल, यात काही शंका नाही.
हे सर्व चित्र २०२० च्या मार्चपर्यंत कायम होतं. मात्र, तेव्हा ‘कोव्हिड’ नावाच्या जागतिक साथरोगानं सर्व जगाला विळखा घातला आणि आपलं सगळ्यांचंच जगणं पूर्वीसारखं राहिलं नाही. करोनाकाळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रांमध्ये मनोरंजन आणि चित्रपटसृष्टी होती. अनेक एकपडदा चित्रपटगृहं दीर्घकाळ बंद राहिल्यानं कायमची बंद पडली. लॉकडाउनच्या काळात ‘ओटीटी’ माध्यमाची चांगलीच भरभराट झाली. घरबसल्या मनोरंजनाची ही पर्वणीच होती. सिनेमाप्रेमींना लवकरच त्याची चटक लागली. चित्रपटगृहांचे वाढलेले तिकीटदर, मोठ्या शहरांत वाहतूक कोंडीची, पार्किंगची समस्या आणि चार जणांच्या कुटुंबाला येणारा एक हजार रुपयांहून अधिकचा खर्च यामुळं अनेक जणांनी चित्रपटगृहांकडं पाठ फिरवली. आता तीन वर्षांनी सगळं जगणं पूर्वपदावर आलं असताना मल्टिप्लेक्सही पुन्हा गर्दीनं ओसंडून वाहत आहेत. एकपडदा थिएटर्स मात्र या साथरोगाचे बळी ठरले. आता काही मोजकीच एकपडदा चित्रपटगृहं सुरू आहेत. मात्र, ती आहेत तोवर सिनेमाप्रेमींच्या डोळ्यांतली ती नवा सिनेमा पाहण्याची उत्सुकता, ती चमक कायम राहील. सिनेमा थिएटर्सनी दिलेल्या आठवणी आणि त्यामुळं त्यांच्याशी तयार झालेलं अतूट नातंही शेवटच्या श्वासापर्यंत असंच कायम राहील...

---

(पूर्वप्रसिद्धी : आपले छंद दिवाळी अंक २०२३)

----

26 Feb 2024

ग्राहकहित दिवाळी अंक २३ - लेख

यक्ष
-----


भारतीय चित्रपटसृष्टीतील दिलीपकुमार, राज कपूर व देव आनंद या प्रख्यात नायकत्रयीतील देव आनंदची जन्मशताब्दी नुकतीच २६ सप्टेंबरला झाली. याचाच अर्थ देव आनंद हयात असता तर तो त्या दिवशी शंभर वर्षांचा झाला असता. पण मग असं वाटलं, की देव आनंद केवळ शरीरानं आपल्यातून गेला आहे. एरवी तो आपल्या अवतीभवती आहेच. त्याच्या त्या देखण्या रूपानं, केसांच्या कोंबड्याच्या स्टाइलनं, तिरकं तिरकं धावण्याच्या शैलीनं, थोडासा तुटलेला दात दाखवत नायिकेला प्रेमात पाडणाऱ्या स्मितहास्याच्या रूपानं, त्याच्या त्या विशिष्ट टोपीच्या रूपानं, त्या स्वेटरच्या रूपानं - देव आनंद आपल्यात आहेच.
उण्यापुऱ्या शंभर-सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेल्या चित्रपटसृष्टीवर तब्बल सहा दशकं आपल्या अस्तित्वाची ठसठशीत मोहोर उमटवणारा हा माणूस म्हणजे ‘यक्ष’ होता - आणि ‘यक्ष’ अजरामर असतात. आणि हो, ‘नंदा प्रधान’मध्ये पु. ल. देशपांडे म्हणाले, तसं ‘यक्षांना शापही असतात.’ देव आनंदलाही ते होते. त्याला चिरतरुण राहण्याच्या एका झपाटलेपणाचा शाप होता. त्यामुळं तो आयुष्यभर २५ वर्षांचाच राहिला. आपणही आपल्या भावासारखे उत्तम चित्रपट दिग्दर्शन करू शकतो, असं त्याला वाटायचं. हा आत्मविश्वास अजब होता. त्यामुळं वयाच्या उत्तरार्धात देव आनंदचा नवा सिनेमा ही एक हास्यास्पद, टर उडविली जाणारी गोष्ट ठरली. मात्र, ‘देवसाब’ना त्याचं काही वाटायचं नाही. मुळात भूतकाळात रमणारा हा माणूसच नव्हता. सतत पुढच्या काळाचा आणि प्रसंगी काळाच्या पुढचा विचार करायचा. स्वत:चे प्रदर्शित झालेले सिनेमेही हा माणूस पाहायचा नाही. त्याच वेळी आपण मात्र त्याच्या ‘अभी ना जाओ छोडकर’, ‘खोया खोया चांद’, ‘ये दिल ना होता बेचारा’, ‘होठों पे ऐसी बात’, ‘तेरा मेरा प्यार अमर’, ‘हैं अपना दिल तो आवारा’, ‘उपरवाला जान कर अंजान है’, ‘दिल का भंवर करे पुकार’ या आणि अशाच कित्येक कृष्णधवल गाण्यांत हरवून गेलेलो असतो.
बारा वर्षांपूर्वी देव आनंद शरीराने आपल्यातून गेला... एका रविवारी सकाळीच तो गेल्याचा एसेमेस मोबाइलवर आला आणि पहिला विचार मनात आला, की अरेरे, अकाली गेला...! ८८ हे काय वय होतं त्याचं जाण्याचं? देव आनंद किमान पावणेदोनशे वर्षं जगेल, अशी खात्री होती. ८८ हे आपल्यासारख्या सामान्यजनांसाठी वृद्धत्वाचं वय असेल... पण देव आनंद नावाच्या अजब रसायनासाठी नाही. तो वरचा देव या भूलोकीच्या देवाला घडविताना त्यात वृद्धत्व घालायला विसरला असावा. त्यामुळंच देव आनंद लौकिकार्थानं, वयाच्या हिशेबानं वाढला असेल, पण मनानं तो पंचविशीच्या पुढं कधीच गेला नाही. म्हणून तर तो गेला त्याच वर्षी त्याचा 'हम दोनो' पन्नास वर्षांनी रंगीत होऊन झळकला होता आणि त्याच वेळी 'चार्जशीट' हा त्याचा नवा-कोरा सिनेमाही रिलीज झाला होता. त्यातही 'हम दोनो'च अधिक चालला हे वेगळं सांगायला नको. देव आनंदसाठी जसं त्याचं वय पंचविशीला गोठलं होतं, तसं प्रेक्षकांसाठीही तोच 'हर फिक्र को धुएं में उडाता चला गया' म्हणणारा देवच आठवणींत कायमचा ‘फ्रीज’ झाला होता. स्वतः देव आनंदला याची फिकीर नव्हती. 'हर फिक्र को धुएं में उडाता चला गया' हेच त्याचं जीवनविषयक तत्त्वज्ञान होतं. एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीची किती पराकोटीची पॅशन असावी, याचं देव हे जितंजागतं उदाहरण होतं. देव सिनेमासाठी होता आणि सिनेमा देवसाठी... दोघांनीही परस्परांची साथ शेवटपर्यंत सोडली नाही. त्यामुळंच त्याच्या नव्या सिनेमांच्या पोस्टरवर नातीपेक्षा लहान वयाच्या नायिकांना कवेत घेऊन उभा राहिलेला देव कधीही खटकला नाही.
देव आनंद ही काय चीज होती? एव्हरग्रीन, चॉकलेट हिरो, बॉलिवूडचा ग्रेगरी पेक (खरं तर ग्रेगरीला हॉलिवूडचा देव आनंद का म्हणू नये?), समस्त महिलांच्या हृदयाची धडकन अशा विविध नामाभिधानांनी ओळखलं जाणारं हे प्रकरण नक्की काय होतं? पन्नासच्या दशकानं हिंदी चित्रपटसृष्टीला दिलेल्या तीन महानायकांपैकी देव एक होता, हे तर निर्विवाद! पुण्यात प्रभात स्टुडिओत उमेदवारी करणारा आणि 'लकी'त चाय-बनमस्का खायला येणारा, सडपातळ बांध्याचा देव आनंद नावाचा हा देखणा युवक पुढं समस्त चित्रसृष्टीवर साठ वर्षांहून अधिक काळ राज्य करतो याचं रहस्य काय? एक तर देव आनंदचं पडद्यावरचं व्यक्तिमत्त्व सदाबहार, प्रसन्न असायचं. त्याचा अभिनय अगदी महान दर्जाचा होता, असं नाही, पण स्वतःला छान प्रेझेंट करायला त्याला जमायचं. शिवाय तो देखणा होताच. साठच्या दशकात त्यानं केलेल्या सिनेमांमुळं रोमँटिक हिरो हे बिरुद त्याला आपोआपच येऊन चिकटलं. त्याचं ते हातवारे करीत गाणी म्हणणं, त्याचा तो केसांचा कोंबडा, मिश्कीलपणे नायिकेच्या मागे गोंडा घोळणं या सगळ्यांतून देवचा नायक साकारायचा. जेव्हा सिनेमा हे एकमेव मनोरंजनाचं साधन होतं, त्या काळात भारतातल्या तमाम महिलांच्या हृदयस्थानी हे महाशय का विराजमान झाले असतील, याचा सहजच तर्क बांधता येतो. देव आनंदनं प्रेक्षकांना रोमँटिकपणा म्हणजे काय, हे शिकवलं... व्यवस्थित टापटीप राहणं, उत्कृष्ट फर्डं इंग्रजी बोलणं आणि सुंदर स्त्रीवर मनसोक्त प्रेम करणं या गोष्टी (तत्कालीन) भारतीय तरुणाई कुणाकडून शिकली असेल, तर फक्त 'देवसाब'कडून...
... कारण देव आनंद नट असला, तरी शिकलेला होता. इंग्रजी साहित्याचा पदवीधर होता. त्याला गीत-संगीताची उत्तम समज होती. त्याचे भाऊ चेतन आनंद आणि विजय आनंदही तसेच बुद्धिमान होते. पन्नास-साठच्या दशकातल्या, स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या पायावर धडपड करून उभ्या राहणाऱ्या, तरुण रक्तानं सळसळणाऱ्या भारताचं देव आनंद हे प्रतीक होतं. 'गाइड'सारख्या अभिजात साहित्यकृतीवर या बंधूंनी तयार केलेला सिनेमाही याची साक्ष आहे. पडद्यावर अतिविक्षिप्त किंवा वाह्यात प्रकार त्यांनी कधी केले नाहीत. पुढं 'हरे रामा हरे कृष्णा'सारखा सिनेमा दिग्दर्शित केल्यावर देवला आपण मोठे दिग्दर्शक आहोत, याचा 'साक्षात्कार' झाला. त्यानंतर आतापर्यंतचा त्याचा प्रवास केवळ थक्क होऊन पाहत राहण्यासारखा होता. मला देव आनंदला प्रत्यक्ष बघण्याची संधी एकदाच मिळाली. साधारण १६-१७ वर्षांपूर्वी तो पुणे आंतरराष्ट्रीय महोत्सवात आला होता, तेव्हा पत्रकार परिषदेत त्याच्या नातवांच्या वयाच्या पत्रकार पोरा-पोरींसमोर त्यानं केलेली तुफान बॅटिंग लक्षात राहिलीय. त्याचे नवे सिनेमे, त्याच्या पत्रकार परिषदा, त्या सिनेमांचं प्रदर्शित होऊन पडणं हे सगळं पब्लिकच्याही अंगवळणी पडलं होतं. दर वेळेला एवढी अफाट एनर्जी कुठून आणतो हा माणूस, असा एकच प्रश्न पडायचा.
देव आनंदचा जन्म २६ सप्टेंबर १९२३ चा. तत्कालीन ‘ब्रिटिश इंडिया’मधील पंजाब प्रांतातील शकरगड (जि. गुरुदासपूर) येथे जन्मलेल्या देवचं जन्मनाव होतं धरमदेव. देवचे वडील पिशोरीलाल आनंद गुरुदासपूर जिल्हा न्यायालयातील नावाजलेले वकील होते. पिशोरीलाल यांना चार मुलगे झाले, त्यातील देव तिसरा. देवची बहीण शीलकांता कपूर म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूरची आई. देवचे थोरले भाऊ म्हणजे मनमोहन आनंद (हेही वकीलच होते), चेतन आनंद आणि धाकटा विजय आनंद. देव आनंदचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण डलहौसी येथील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालं. त्यानंतर तो धरमशाला येथे कॉलेज शिक्षणासाठी गेला. नंतर तो लाहोरला गेला आणि तेथील गव्हर्न्मेंट कॉलेजमधून त्याने इंग्रजी साहित्य हा विषय घेऊन बी. ए. केलं.
पदवी मिळविल्यानंतर लगेचच तो मुंबईला आला. सुरुवातीला त्याने चर्चगेट येथील मिलिटरी सेन्सॉर ऑफिस येथे नोकरी केली. तेव्हा त्याला ६५ रुपये पगार मिळायचा. त्यानंतर त्याने आणखी एका अकाउंटिंग फर्ममध्ये ८५ रुपये पगारावर नोकरी गेली. देवचा मोठा भाऊ चेतन आनंद तेव्हा ‘इंडियन पीपल थिएटर्स असोसिएशन’मध्ये (इप्टा) जात असे. त्याच्यासोबत देव सिनेमे पाहत असे. अशोककुमारचा ‘किस्मत’ हा चित्रपट तेव्हा जोरात चालला होता. तो बघून देवच्या मनात अभिनेता होण्याची ऊर्मी निर्माण झाली.
प्रभात फिल्म कंपनीचे बाबूराव पै यांनी देव आनंदला पहिला ‘ब्रेक’ दिला. देव पहिल्यांदा त्यांच्या कार्यालयात धडकला, तेव्हा देवचा चेहरा, त्याचं हास्य व आत्मविश्वास बघून पै खूप प्रभावित झाले. त्यांच्यामुळेच प्रभात फिल्म कंपनीच्या ‘हम एक है’ (१९४६) या चित्रपटात त्याला नायकाची भूमिका मिळाली. हिंदू-मुस्लिम एकतेवर आधारित या चित्रपटात देवने हिंदू तरुणाची भूमिका केली होती आणि कमला कोटणीस त्याची नायिका होती. या चित्रपटाचं पुण्यात चित्रीकरण सुरू असताना देवची मैत्री गुरुदत्तशी झाली. त्या दोघांनी असं ठरवलं होतं, की ज्याला चित्रपटसृष्टीत आधी मोठं काम मिळेल, त्याने दुसऱ्याला मदत करायची. त्यानुसार देवने जेव्हा ‘बाजी’ (१९५१) चित्रपट तयार करायचं ठरवलं, तेव्हा त्याचं दिग्दर्शन गुरुदत्तकडं दिलं.
याच काळात देव आनंदला सुरैयासोबत काही सिनेमे करायला मिळाले. त्या दोघांची जोडी जमली. इतकंच नव्हे, तर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. देव तुलनेने नवखा होता, तर सुरैया तेव्हाही मोठी स्टार होती. ‘विद्या’, ‘जीत’, ‘शायर’, ‘अफसर’, ‘निली’, ‘सनम’ अशा काही सिनेमांत दोघे एकत्र झळकले. सुरैयाचं नाव कायम आधी पडद्यावर येई. ‘विद्या’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी ‘किनारे किनारे चले जाएंगे’ या गाण्याचं चित्रीकरण सुरू असताना, सुरैयाची बोट उलटली व ती पाण्यात पडली. देवनं तिला वाचवलं. या घटनेनंतर ती त्याच्या प्रेमात पडली. सुरैयाची आजी या दोघांवर लक्ष ठेवून असायची. ‘जीत’ चित्रपटाच्या सेटवर या दोघांनी प्रत्यक्ष लग्न करायचंही ठरवलं होतं. दोघं एकमेकांना पत्रं पाठवायचे. मात्र, नियतीच्या मनात निराळंच काही होतं. देवनं सुरैयाला तेव्हाच्या तीन हजार रुपये किमतीची हिऱ्याची अंगठीही दिली होती. मात्र, सुरैयाच्या आजीनं या लग्नाला विरोध केला. सुरैयाचं कुटुंब मुस्लिम होतं, तर देव हिंदू! अखेर लग्न काही झालेच नाही. सुरैया अखेरपर्यंत अविवाहित राहिली. त्या दोघांनीही एकत्र काम करणं थांबवलं आणि एका प्रेमकहाणीचा करुण अंत झाला.
देवला पहिला मोठा ब्रेक अशोककुमार यांनी दिला. बॉम्बे टॉकीजची निर्मिती असलेल्या ‘जिद्दी’ (१९४८) या चित्रपटात त्यांनी देवला नायक म्हणून घेतलं. हा चित्रपट जोरदार चालला. यात देवची नायिका होती कामिनी कौशल. पुढच्याच वर्षी देवनं ‘नवकेतन’ ही स्वत:ची निर्मिती संस्था काढली आणि तो स्वत: चित्रपट काढू लागला. गुरुदत्तनं दिग्दर्शित केलेला ‘बाजी’ हा क्राइम थ्रिलर चित्रपट जोरदार चालला. यात देवच्या नायिका होत्या गीता बाली आणि कल्पना कार्तिक. कल्पना कार्तिकचं मूळ नाव होतं मोनासिंह. या दोघांनी नंतर ‘आँधियाँ’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘हाउस नं. ४४’ व ‘नौ दो ग्यारह’ हे चित्रपट सोबत केले. ‘टॅक्सी ड्रायव्हर’च्या चित्रीकरणाच्या वेळी कल्पना व देव प्रेमात पडले व देवनं तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला.
यानंतर कल्पना कार्तिकनं आपल्या अभिनय कारकिर्दीला पूर्णविराम दिला. देवची घोडदौड सुरूच होती. ‘मुनीमजी’, ‘फंटूश’, ‘सीआयडी’, ‘पेइंग गेस्ट’ असे त्याचे चित्रपट आले आणि जोरदार हिट झाले. देवची एक स्टाइल आता प्रस्थापित झाली होती. देखणा-रुबाबदार चेहरा, मान तिरकी करत बोलण्याची लकब, भरभर भरभर चालण्याची अनोखी अदा आणि त्याचं ते ‘मिलियन डॉलर’ हास्य याच्या जोरावर त्यानं त्या काळातल्या तमाम प्रेक्षकवर्गावर, विशेषत: महिलांवर गारूड केलं.
याच काळात देवची जोडी वहिदा रेहमानबरोबर जमली. वहिदाला चित्रपटसृष्टीत आणले ते गुरुदत्तनं. ती देव आनंदच्या राज खोसला दिग्दर्शित ‘सीआयडी’मध्ये पहिल्यांदा झळकली. त्यानंतर ‘सोलहवां साल’ (१९५८), काला बाजार (१९६०) आणि ‘बात एक रात की’ (१९६२) या यशस्वी चित्रपटांत या दोघांची जोडी दिसली. मधल्या काळात देवनं दिलीपकुमारसोबत ‘इन्सानियत’ (१९५५) हा सुपरहिट चित्रपट दिला. मधुबाला व नलिनी जयवंतसोबतचा ‘काला पानी’ (१९५८) हा सिनेमाही जोरदार चालला. याच चित्रपटासाठी देवला पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं ‘फिल्म फेअर’ ॲवॉर्ड मिळालं. या सर्व काळात देवनं आपल्या भूमिकांत वैविध्य आणण्याचा प्रयत्न केला. त्यानं ‘जाल’, ‘दुश्मन’, ‘काला बाजार’ अशा सिनेमांत नकारात्मक छटा असलेल्या भमिका केल्या, तर ‘पॉकेटमार’, ‘काला पानी’, ‘शराबी’, ‘बंबई का बाबू’ अशा सिनेमांत काहीशा दु:खी छटा असलेल्या भूमिकाही केल्या. मात्र, रोमँटिक हिरो हीच त्याची प्रतिमा सर्वाधिक प्रबळ ठरली व चाहत्यांमध्ये ठसली. त्यातही वहिदा रेहमान, नूतन, साधना, कल्पना कार्तिक, गीताबाली या नायिकांसोबत त्याची जोडी विशेष जमली. नूतनसोबत ‘दिल का भंवर करे पुकार...’ या गाण्यात कुतुबमिनारच्या पायऱ्या उतरतानाचा देव आनंद (आणि नूतनही) विसरणं अशक्य! तीच गोष्ट ‘तेरा मेरा प्यार अमर...’ गाण्यातल्या साधना आणि देवची.

साठचं दशक देवसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार होतं. त्याची कारकीर्द याच दशकात चढत्या भाजणीनं सर्वोच्च शिखरावर जाणार होती. सन १९६१ मध्ये त्याचा ‘हम दोनो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं तुफान यश मिळवलं. एस. डी. बर्मन हे ‘नवकेतन’चे ठरलेले संगीतकार होते. जयदेव हे त्यांचे सहायक. मात्र, या चित्रपटासाठी देवनं एस. डी. बर्मन यांची परवानगी घेऊन जयदेव यांना स्वतंत्रपणे संगीत द्यायला सांगितलं. त्याचा हा निर्णय किती योग्य ठरला, हे नंतर काळानं सिद्ध केलंच. आजही ‘हम दोनो’ची सर्व गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. ‘अभी ना जाओ छोडकर...’ हे हिंदी चित्रपट संगीतातील महत्त्वाच्या युगुलगीतांपैकी एक मानलं जातं. या चित्रपटात साधना व नंदा या त्याच्या नायिका होत्या. देवची यात दुहेरी भूमिका होती. हा चित्रपट ५० वर्षांनी, म्हणजे २०११ मध्ये रंगीत अवतारात पुन्हा थिएटमध्ये प्रदर्शित झाला होता आणि तेव्हाही त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद लाभला होता. (मी स्वत: तेव्हा हा चित्रपट प्रथमच मोठ्या पडद्यावर पाहिला.) यानंतर ‘तेरे घर के सामने’, ‘मंझिल’ नूतनसोबत, ‘किनारे किनारे’ मीनाकुमारीसोबत, ‘माया’ माला सिन्हासोबत, ‘असली नकली’ साधनासोबत, ‘जब प्यार किसी से होता है’ आणि ‘महल’ आशा पारेखसोबत आणि ‘तीन देवियाँ’ कल्पना, सिमी गरेवाल व नंदासोबत असे देवचे एकापाठोपाठ एक ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित झाले आणि बॉलिवूडचा रोमँटिक नायक अशी त्याची नाममुद्रा आणखी ठळकपणे सिद्ध करून गेले.

‘गाइड’ नावाची दंतकथा

याच दशकात, १९६५ मध्ये देव आनंदच्या कारकिर्दीतला कदाचित सर्वांत महत्त्वाचा चित्रपट ‘गाइड’ प्रदर्शित झाला. हा त्याचा पहिला रंगीत चित्रपट. या चित्रपटाने इतिहास घडवला. प्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांच्या याच नावाच्या कादंबरीवरून हा चित्रपट तयार करण्यात आला. इंग्रजी साहित्याचा अभ्यासक असलेल्या देवला ही कादंबरी भावली. ती रूपेरी पडद्यावर आणायची हे त्याचं स्वप्न होतं. ‘गाइड’च्या निर्मितीच्या अनेक कथा, दंतकथा प्रचलित आहेत. यातील ‘रोझी’ची भूमिका वहिदा रेहमानच करणार, यावर देव ठाम होता. दिग्दर्शन आधी चेतन आनंद करणार होता, मात्र त्यानं नायिकेच्या भूमिकेसाठी प्रिया राजवंश (त्याची प्रेयसी) असावी, असा हट्ट धरला. त्याबरोबर देवनं चेतन आनंदचाच पत्ता कट केला. त्यानंतर त्याने राज खोसला यांना विचारलं. मात्र, राज खोसला आणि वहिदा रेहमान यांचं फार बरं नव्हतं. त्यामुळं त्यांनीही नायिकेबाबत नाराजी व्यक्त केली, असं सांगतात. अखेर वहिदानंही ‘मी या प्रोजेक्टमधून बाजूला होते, तुमच्या दिग्दर्शकाला मी चालणार नाही,’ असं सांगून पाहिलं. मात्र, देव वहिदालाच ती भूमिका देण्यावर ठाम होता. त्यामुळं राज खोसलाही गेले आणि तिथं मग विजय आनंद आला. विजय आनंद ऊर्फ ‘गोल्डी’नं ‘गाइड’चं सोनं केलं. पुढचा सगळा इतिहास आहे. राजू गाइड ही भूमिका देव आनंदच्या कारकिर्दीतील अजरामर भूमिका ठरली. या चित्रपटापूर्वी नृत्यनिपुण वहिदाला तिची नृत्यकला दाखविण्याची संधी देणाऱ्या फारशा भूमिका मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे तिनं देवला अशी अट घातली होती म्हणे, की माझं एकही नृत्य कापायचं नाही; तरच मी ही भूमिका करीन. देवनं अर्थातच ही अट मान्य केली आणि वहिदाचं नृत्यनैपुण्य सर्वांसमोर आलं. देवला हा चित्रपट हिंदीसोबतच इंग्लिशमध्येही तयार करायचा होता. त्यासाठी त्यानं हॉलिवूड प्रॉडक्शनसोबत काम केलं. नोबेल पारितोषिक विजेत्या प्रख्यात लेखिका पर्ल बक यांना त्याने इंग्लिश चित्रपटासाठी लेखन करायला सांगितलं होतं. खुद्द आर. के. नारायण यांना ‘गाइड’ चित्रपट फारसा भावला नव्हता, असं म्हणतात. ते काही का असेना, भारतीय प्रेक्षकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला, यात शंका नाही. मुळात ‘गाइड’मधील राजू आणि रोझीचं प्रेम त्या काळाच्या पुढचं होतं. असा काळाच्या पुढचा चित्रपट काढण्याचं आणि (भारतीय जनमानसाची नाडी ओळखून) त्यातल्या प्रेमाला वासनेचा स्पर्श होऊ न देता ते उदात्त वाटेल याची काळजी घेण्याचं काम देव व विजय आनंद या बंधूंनी यशस्वीपणे केलं, हे निश्चित.
विजय आनंदनेच दिग्दर्शित केलेला ‘ज्वेल थीफ’ हा पुढचा क्राइम थ्रिलरदेखील जोरदार हिट झाला. यात देवची नायिका नृत्यनिपुण वैजयंतीमाला होती. यातलं ‘होठों पे ऐसी बात’ हे गाणं आजही गणेशोत्सवातलं रोषणाईसाठीचं लाडकं गाणं आहे. यानंतर देव व विजय आनंद यांनी ‘जॉनी मेरा नाम’च्या (१९७०) रूपाने आणखी एक ब्लॉकबस्टर सिनेमा दिला. या वेळी देवचं वय होतं ४७, तर त्याच्याहून तब्बल २५ वर्षांनी लहान असलेली, २२ वर्षीय हेमामालिनी त्याची नायिका होती. या सिनेमाला मिळालेल्या तुडुंब यशामुळं हेमामालिनी मोठी स्टार म्हणून ओळखली जाऊ लागली.

दिग्दर्शनात पदार्पण

साठचं दशक अशा रीतीनं देवला त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर घेऊन गेलं. आता देवला स्वत:ला चित्रपट दिग्दर्शित करण्याची इच्छा निर्माण झाली. ‘प्रेमपुजारी’द्वारे देव दिग्दर्शनातही उतरला. जहिदा या अभिनेत्रीचं या चित्रपटाद्वारे पदार्पण झालं होतं. दुसरी नायिका अर्थात वहिदा रेहमान होती. मात्र, हा सिनेमा फ्लॉप ठरला. देवला दिग्दर्शक म्हणून खरं यश मिळवून दिलं ते ‘हरे रामा हरे कृष्णा’ (१९७१) या चित्रपटाने. हिप्पी संस्कृतीवर आधारित या चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण नेपाळमध्ये झालं होतं. या चित्रपटाद्वारे देव आनंदनं झीनत अमानला रूपेरी पडद्यावर झळकवलं. झीनत रातोरात सुपरस्टार झाली. यातलं आशा भोसलेंनी गायलेलं ‘दम मारो दम’ हे गाणंही तुफान गाजलं. या चित्रपटादरम्यान देव आनंद कोवळ्या, पण मादक अशा झीनतच्या प्रेमात पडला होता. त्याबाबत तेव्हाच्या फिल्मी मासिकांतून भरपूर गॉसिप प्रसिद्ध व्हायचं. पुढं राज कपूरच्या पार्टीत देवनं झीनतला पाहिलं आणि नंतर त्यानं तिचा विषय डोक्यातून काढून टाकला, असं सांगतात. राज कपूरनं नंतर तिला ‘सत्यम शिवम सुंदरम’मध्ये झळकवलं, हे सर्वविदीत आहे.
याच काळात राज कपूर आणि दिलीपकुमार हे देवचे दोन्ही सुपरस्टार सहकलाकार नायक म्हणून काहीसे उतरणीला लागले होते. देव आनंदचेही ‘सोलो हिरो’ म्हणून काही चित्रपट फ्लॉप झाले. मात्र, तो तरीही त्याच्याहून वयाने कमी असलेल्या शर्मिला टागोर, योगिता बाली, राखी, परवीन बाबी आदी नायिकांसोबत काम करत राहिला आणि त्यातले काही सिनेमे चाललेही! विशेषत: १९७८ मध्ये आलेला ‘देस-परदेस’ जोरदार चालला. या वेळी देवचं वय होतं फक्त ५५ आणि त्याची नायिका होती अवघ्या २१ वर्षांची टीना मुनीम!
याच वेळी देशात आणीबाणीचा काळ होता. तेव्हा देवनं उघडपणे आणीबाणीच्या विरोधात भूमिका घेतली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत त्यानं प्रचार केला होता. नंतर त्याने चक्क ‘नॅशनल पार्टी ऑफ इंडिया’ नावाचा राजकीय पक्षही स्थापन केला होता. तो कालांतरानं अर्थातच त्यानं गुंडाळून टाकला. देव आनंद हा माणूस असाच होता. मनस्वी!
‘देस-परदेस’च्या यशानंतरच तेव्हाच्या माध्यमांनी देवला ‘एव्हरग्रीन’ हे बिरुद दिलं. या सिनेमाच्या यशामुळं बासू चटर्जींनी त्याला ‘मनपसंद’मध्ये भूमिका दिली. (‘सुमन सुधा’ हे लता मंगेशकर यांच्या आवाजातलं सुंदर गाणं याच चित्रपटातलं!) याच यशाच्या लाटेवर त्याचे पुढचे दोन चित्रपट ‘लूटमार’ आणि ‘स्वामीदादा’ (१९८२) हेही हिट ठरले.
याच काळात देवनं त्याचा मुलगा सुनील आनंद याला नायक म्हणून घेऊन, ‘आनंद और आनंद’ हा ‘क्रेमर व्हर्सेस क्रेमर’ या लोकप्रिय हॉलिवूड सिनेमावर आधारित चित्रपट काढला. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर असा काही कोसळला, की सुनील आनंदनं त्यानंतर चित्रपटात कधीही काम न करण्याचा सुज्ञ निर्णय घेतला.
देव आनंदनं आता साठी ओलांडली होती. तरीही त्याचे ‘हम नौजवान’ आणि ‘लष्कर’सारखे चित्रपट चांगले चालले. विशेषत: ‘लष्कर’मधल्या (१९८९) प्रोफेसर आनंद या त्याच्या भूमिकेचं समीक्षकांनीही कौतुक केलं होतं. यानंतर नव्वदच्या दशकात त्यानं ‘प्यार का तराना’, ‘गँगस्टर’, ‘रिटर्न ऑफ ज्वेल थीफ’, ‘अमन के फरिश्ते’, ‘सौ करोड’, ‘सेन्सॉर’ आदी अनेक चित्रपट काढले, पण ते सगळे फ्लॉप ठरले. दिग्दर्शक देव आनंदचा अवतार कधीच समाप्त झाला होता. कायम होता तो देव आनंदचा उत्साह!
असं म्हणतात, की देव आनंदचं ऑफिस अतिशय साधंसुधं होतं. त्याचं स्वत:चं राहणीमान मात्र स्टायलिश होतं. तो ब्रिटिश पद्धतीचे शिष्टाचार पाळणारा ‘सभ्य गृहस्थ’ होता. त्याच्या सहनायिका त्याच्याविषयी नेहमी आदरयुक्त प्रेमानं बोलायच्या. देवच्या सहवासात आम्हाला एकदम निर्धास्त, ‘कम्फर्टेबल’ वाटायचं असं त्या म्हणायच्या. देव आनंदनं आपल्या वागण्या-बोलण्यातली ही आदब, ही ‘ग्रेस’ कायम जपली. देव आनंद हा हिंदी चित्रपटसृष्टीतला पहिला ‘फॅशन आयकॉन’ होता. त्याचे स्कार्फ, मफलर, जर्किन; एवढंच काय, त्याची सिगारेट हीदेखील फॅशन म्हणून प्रचलित व्हायची. त्याच्यासारखा केसाचा कोंबडा काढून फिरण्याची तेव्हाच्या तरुणाईत क्रेझ असे. 

त्याला मुंबईविषयी अतोनात प्रेम होतं. मुंबई शहर कालांतराने बकाल होत गेलं. ती अवस्था बघून देव कायम व्यथित व्हायचा. त्यानं १९५० च्या दशकातील ब्रिटिशांच्या प्रभावाखालची आखीव-रेखीव, कमी गर्दीची, टुमदार इमारतींची, चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली, उच्च अभिरुची जपणारी, उत्तमोत्तम स्टुडिओ असणारी, भारतात दुर्मीळ असलेलं ‘वर्क कल्चर’ असलेली मुंबई अनुभवली होती. नंतर नंतर तो बरेचदा परदेशातच असायचा. विशेषत: लंडनमध्ये. त्यानं अखेरचा श्वास घेतला तोही लंडनमध्येच - ३ डिसेंबर २०११ रोजी.
देव आनंद नावाची रसिली, रम्य, रोचक कथा आता ‘दंतकथा’ म्हणूनच उरली आहे. बघता बघता त्याला जाऊन आता १२ वर्षं होत आली. मात्र, मन तरी असंच म्हणतंय, की देव आनंदचं शरीर फक्त गेलं... पण यक्ष कधी मरतात का?

----

(पूर्वप्रसिद्धी : ग्राहकहित दिवाळी अंक, २०२३)

---