29 May 2023

पासवर्ड दिवाळी अंक २२ - कथा

सर रघू विश्वेश्वरय्या..
------------------------

दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आणि रघूनं जोरदार उडी मारून आनंद व्यक्त केला. यंदा त्याला दिवाळीच्या सुट्टीत दिल्लीला फिरायला जायचं होतं. त्याचे आई-बाबा आणि सोबत त्याचा लाडका मित्र साहिल पण असणार होता. साहिलही रघूसारखाच सातवीत होता. साहिलचे आई-बाबाही अर्थातच सोबत असणार होते. या काकांकडं मोठ्ठी एसयूव्ही होती, म्हणून त्या गाडीतून गोव्याला जायचं ठरत होतं. मात्र, रघूला रेल्वेनं प्रवास करायला आवडायचं. त्यामुळं गोव्याचा बेत रद्द होऊन दिल्लीला जायचं ठरलं होतं. रघूनं हट्टानं बाबांना रेल्वेगाडीची तिकिटं काढायला सांगितली होती. त्याच्या बाबांनी वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेसचं तिकीट काढलं. एसी डब्याचं तिकीट वेटिंगवर होतं. वेटिंग म्हणजे काय, आरएसी म्हणजे काय, कन्फर्म म्हणजे काय, पीएनआर म्हणजे काय या सगळ्या प्रश्नांनी रघूनं बाबांना भंडावून सोडलं. रेल्वेगाडीतून एका वेळी साधारण हजार लोक प्रवास करू शकतात. रेल्वे डब्यांचे प्रकार असतात. जनरल डबा, आरक्षित थ्री टायर स्लीपर, सेकंड एसी आणि फर्स्ट क्लास असे वेगवेगळे डबे असतात. त्यातल्या सेवासुविधांनुसार त्यांची तिकिटं वेगवेगळी असतात. रेल्वेगाडीचं आरक्षण म्हणजेच रिझर्वेशन चार महिने आधी करता येतं. मात्र, सणासुदीच्या आणि सुट्टीच्या दिवसांत लोक खूप जास्त प्रवास करतात, त्यामुळं गाड्यांना गर्दी असते. अनेक लोक आधी तिकीट आरक्षित करतात आणि नंतर काही कारणानं रद्द करतात. त्यामुळं अनेक लोक ‘वेटिंग’वरचं, म्हणजे प्रतीक्षा यादीतील तिकीट घेऊन ठेवतात. नशीब चांगलं असेल, तर हे तिकीट कन्फर्म होतं आणि तुम्हाला प्रवास करता येतो अशी सगळी माहिती रघूच्या बाबांनी त्याला दिली. तरी रघूची उत्सुकता शमत नव्हती. मग त्यानं ‘यू ट्यूब’वर रेल्वेगाड्यांचे खूप व्हिडिओ पाहिले. रेल्वेचं हे एक वेगळंच जग असल्याचं त्याच्या लक्षात आलं. भारतात रेल्वेचं केवढं मोठ्ठं जाळं आहे, हे बघून त्याला फार भारी वाटलं. राजधानी एक्स्प्रेस गाड्यांच्या शर्यतीचे व्हिडिओ बघून तर तो हरखून गेला. दोन गाड्या अशा एकाच वेळी दोन ट्रॅकवरून एकाच दिशेनं धावतात, हे त्यानं यापूर्वी कधीही बघितलं नव्हतं. हल्ली स्मार्टफोन आल्यापासून कुणीही व्हिडिओ करू शकत असल्यानं रेल्वे प्रवासाचे हजारो व्हिडिओ यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आले होते. रघूला ते व्हिडिओ बघायचा नाद लागला. अनेक परदेशी प्रवाशांनी भारतात प्रवास करून त्याचे व्हिडिओ केले होते. त्यांच्या नजरेतून आपला देश बघताना रघूला गंमत वाटत होती. आता उत्सुकतेनं रघूनं भारतातल्या रेल्वेचा इतिहास वाचायला सुरुवात केली. भारतात १८५३ मध्ये पहिली रेल्वेगाडी बोरिबंदर ते ठाणे या स्थानकांदरम्यान धावली ही माहिती त्याला समजली. पुणे आणि मुंबई दरम्यानचा रेल्वेचा अवघड घाट इंग्रजांच्या काळात कसा तयार झाला, हेही त्यानं वाचलं. रघूनं आत्तापर्यंत अनेकदा पुणे ते मुंबई प्रवास रेल्वेनं केला होता. त्याची एक मावशी मुंबईत राहायची. मात्र, या रेल्वेमार्गावर लागणारे बोगदे आणि त्यातून काढलेला हा लोहमार्ग याची माहिती वाचताना त्याचे डोळे विस्फारले. भारतातील सर्वांत लांब धावणारी रेल्वे हिमसागर एक्स्प्रेस आहे आणि ती काश्मीरमधील जम्मूपासून निघून थेट दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत जाते, हे वाचून रघूनं नकाशाच काढला. त्या लांबलचक प्रवासाचा मार्ग त्यानं पेन्सिलनं नकाशावर पुन्हा एकदा काढला. त्या एक्स्प्रेसला दिलेलं समर्पक नाव वाचून त्याला फारच खास वाटलं. हिमालयातून निघून थेट खाली हिंदी महासागरापर्यंत जाणाऱ्या त्या एक्स्प्रेसनं आयुष्यात एकदा तरी प्रवास करायचा असा निश्चय त्यानं करून टाकला. आता त्याला वेगवेगळ्या एक्स्प्रेस गाड्यांची नावं जाणून घ्यायची उत्सुकता लागली. मुंबईहून कोलकत्याला जाणाऱ्या गाडीला गीतांजली एक्स्प्रेस, तर पुण्याहून कोलकत्याला जाणाऱ्या एक्स्प्रेसला आझादहिंद एक्स्प्रेस असं नाव का दिलं असेल, हे त्याच्या लक्षात आलं. इतिहास हा त्याचा आवडता विषय होता. पुण्याहून जम्मूकडं जाणाऱ्या गाडीला झेलम एक्स्प्रेस, तर मुंबईहून भुवनेश्वरला जाणाऱ्या गाडीला कोणार्क एक्स्प्रेस असं नाव आहे, हे त्याला समजलं. मुंबईहून सावंतवाडीला जाणाऱ्या एक्स्प्रेसला ‘तुतारी एक्स्प्रेस’ असं नाव दिल्याचं ऐकल्यावर त्याला फार आनंद झाला. ज्येष्ठ कवी केशवसुत यांच्या प्रसिद्ध अशा ‘तुतारी’ या कवितेचं नाव गाडीला दिल्यामुळं त्याला मराठी साहित्याचा आणि साहित्यिकांचा अभिमान वाटला. पुण्याहून अहमदाबादला जाणाऱ्या गाडीचं नाव ‘अहिंसा एक्स्प्रेस’, तर मुंबईवरून बंगळूरला जाणाऱ्या गाडीचं नाव ‘उद्यान एक्स्प्रेस’ असं आहे, हे वाचल्यावर आता त्याला आश्चर्य वाटलं नाही.
रघू ज्या वास्को-निजामुद्दीन गाडीनं जाणार होता, त्या गाडीविषयी तो बाबांना विचारू लागला. वास्को हे गोव्यातलं एक शहर आहे आणि तिथून ही रेल्वेगाडी दिल्लीला पुणे मार्गे जाते, असं त्याला बाबांनी सांगितलं. गाडी दिल्लीला जाणार आहे तर ‘निजामुद्दीन’ हे काय आहे, असा त्याला प्रश्न पडला. मग त्यानं ‘गुगल’बाबाला विचारलं. तेव्हा ‘हजरत निजामुद्दीन’ हे दिल्ली शहरातील एक मोठं स्टेशन आहे, असं त्याला कळलं. ही गाडी पहाटे चार वाजता पुण्यात येते. त्यामुळं रघूला तर कधी जायचा दिवस उजाडतो (खरं तर मावळतो...) असं होऊन गेलं. अखेर प्रवासाला निघण्याचा दिवस आला. रघूनं सगळी जय्यत तयारी केली होती. थंडीचे दिवस असल्यानं ‘हुडी’वालं जर्किन, शूज, हँड्सफ्री इअरफोन, खिशात कॅडबरी असा सगळा जामानिमा करून तो सज्ज झाला. साहिल आणि त्याची फॅमिली परस्पर स्टेशनवर येणार होते. रघूच्या बाबांनी कॅब बुक केली. खूप उशिरा स्टेशनवर जाण्यापेक्षा रात्री बारा वाजताच स्टेशनवर जायचं असं त्यांनी ठरवलं होतं. कॅब आली. रघूच्या घरापासून स्टेशन ४५ मिनिटं दूर होतं. रात्री ११.२० ला निघालेली कॅब बरोबर १२ वाजून १० मिनिटांनी रेल्वे स्टेशनच्या आवारात शिरली. समोरच महात्मा गांधींचा भव्य पुतळा दिसला. पुणे स्टेशनची जुनी दगडी इमारत दिव्यांनी झगमगून निघाली होती. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्टेशनला तिरंगी दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळं ही मूळची देखणी इमारत आणखीन झळाळून उठली होती. आता या इमारतीविषयी त्याच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. आता बाबाला त्रास द्यायचा नाही, हे त्याला माहिती होतं. त्याऐवजी ‘गुगल’बाबाला विचारायचं; अजिबात कटकट न करता तो उत्तर देतो, हे त्याला ठाऊक झालं होतं. त्यानं लगेच ‘पुणे रेल्वे स्टेशन’ असा सर्च दिला. त्याबरोबर स्टेशनची सगळी माहिती त्याच्या मोबाइलवर अवतरली. हे स्टेशन १९२५ मध्ये बांधून पूर्ण झालंय हे वाचून त्याला आश्चर्य वाटलं.
रघू आणि त्याचे आई-बाबा आता स्टेशनमध्ये शिरले. एवढ्या रात्रीही स्टेशनच्या बाहेर व आत भरपूर गर्दी होती. वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत-जात होते. त्यात भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतांतले लोक दिसत होते. वेषभूषा मात्र बहुतेकांची सारखीच होती. थंडीमुळं अनेकांच्या अंगात स्वेटर, कार्डिगन, जर्किन्स होती. त्यात मात्र वैविध्य दिसत होतं. स्टेशनवर सगळीकडं इलेक्ट्रॉनिक फलक लावले होते आणि त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांची माहिती प्रदर्शित होत होती. स्टेशनवर हल्ली बऱ्यापैकी स्वच्छता असते, असं रघूला दिसून आलं. कचरा इकडेतिकडे न फेकता लोक कचराकुंडीत टाकत होते. विशेषत: लहान मुलं त्यांच्या खाण्याची रॅपर्स न चुकता कचराकुंडीला (तिथं हिंदीत ‘कूडादान’ लिहिलं होतं...) दान करत होती. तिथं खाण्याचे स्टॉल होते. त्यासमोर उभं राहून बरेच लोक तिथले पदार्थ खात होते. वडापावला नेहमीप्रमाणेच भरपूर डिमांड होती. तिथं एक पुस्तकांचाही स्टॉल होता. पण तिथली पुस्तकं बरीचशी हिंदीत होती. काही इंग्रजीत होती. मात्र, रघूच्या बाबांनी त्याला सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचं एक चरित्र दिलं होतं. ते त्याला या प्रवासात वाचायचं होतं. आत्ता त्यांची कॅब ‘सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या उड्डाणपुला’वरूनच आली होती. नुकतीच शाळेत १५ सप्टेंबरला विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीदिनी त्यांची माहिती त्याच्या शिक्षकांनी सांगितली होती. रघूला ती ऐकून विश्वेश्वरय्या यांच्याविषयी आणखी कुतूहल वाटू लागलं होतं. कधी एकदा ते पुस्तक वाचतो असं त्याला झालं होतं.
थोड्याच वेळात साहिल आणि त्याचे आई-बाबाही आले. मग रघूचे आई-बाबा आणि साहिलचे आई-बाबा गप्पा मारत बसले. साहिल आणि रघू यांनी एकमेकांना बघताच मिठी मारली. दोघांनीही हँड पंच केला आणि ‘यो...’ असं ओरडले. रघूला बसून बसून लगेच कंटाळा आला होता. मग जरा स्टेशनवर चक्कर मारून येऊ का, असं त्यानं बाबांना विचारलं. त्यावर बाबांनी ‘साहिल आणि तू बरोबर जा आणि मोबाइल सतत हातात ठेव’ असं सांगून परवानगी दिली. स्टेशनच्या बाहेर जायचं नाही आणि रुळ क्रॉस करायचे नाहीत, अशीही सक्त ताकीद त्यांनी दिली. चहा घ्यावासा वाटला, तर थोडे पैसेही रघूकडं दिले. रघू आणि साहिल हातात हात घालून निघाले. स्टेशनवरचं ते रंगबिरंगी, हलतं-फिरतं जिवंत जग रघूला फार आवडलं. तो स्टेशनवरच्या माणसांचं निरीक्षण करू लागला. सगळ्याच लोकांकंडं स्वेटर नव्हते, असं त्याच्या लक्षात आलं. प्रत्येकाकडचं सामानही वेगवेगळं होतं. कुणी वळकट्या बांधल्या होत्या, तर कुणाकडे चाकांवर पळणाऱ्या भारी बॅगा होत्या. कुणाकडं अगदी साध्या पिशव्या होत्या, तर तरुण मुलांकडं काळ्या सॅक होत्या. कुणी भारी भारी शूज घातले होते, तर काहींजवळ अगदी साध्या स्लीपर होत्या. काही जण मोठ्या ग्रुपने प्रवास करत होते, तर कुणी कुणी अगदी एकटे होते. एक मात्र होतं. बहुतेक सर्वांकडं मोबाइल होते आणि त्यातले ९० टक्के लोक मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसले होते. रघू आणि साहिलला थोड्याच वेळात कंटाळा आला आणि ते आई-बाबांकडं परत आले. आता रात्रीचे दोन वाजले होते. स्टेशनवरची गर्दी थोडी कमी झाली होती.
रघूला बाबांनी दिलेल्या मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांच्या चरित्राची आठवण झाली. त्यानं सॅकमधून ते पुस्तक काढलं. त्यांच्या एका मोठ्या बॅगेवर बसून आणि स्टेशनवरच्या खांबाला टेकून तो ते पुस्तक वाचू लागला. विश्वेश्वरय्या यांच्या अद्भुत जगण्याविषयीचं त्याचं कुतूहल कमी न होता वाढतच होतं. पुण्यातल्या खडकवासला धरणाचं कामही त्यांनीच केलंय हे रघूला माहिती नव्हतं. तो उत्सुकतेनं पुस्तक वाचत होता; पण डोळे कधी पेंगू लागले ते कळलंच नाही. एकदम बाबा ‘रघू, उठ, उठ... गाडी आली...’ असं ओरडून म्हणताहेत असं त्याला वाटलं. त्याचे डोळे उघडले. स्टेशनवरची गडबड वाढली होती. त्यांची गाडी फलाटावर लागली होती. त्यांची तिकिटं कालच कन्फर्म झाली होती. गाडी पकडायला सगळ्यांची एकच झुंबड उडाली. रघूही झोपाळलेल्या अवस्थेत बाबांचा हात धरून गाडीकडं निघाला. आपण कधी डब्यात चढलो, कधी आपल्या बर्थवर आडवे झालो, हे रघूला काहीही आठवलं नाही. थोड्याच वेळात गाडी हलल्याचं त्याच्या लक्षात आलं. रघू सर्वांत खालच्या बर्थवर झोपला होता. त्यानं आग्रहानं ही खालची सीट मागून घेतली होती. त्यानं खिडकीबाहेर बघितलं. स्टेशनवरची माणसं, दिवे भराभर मागं पडत चालले होते. आता गाडीनं चांगलाच वेग घेतला होता. रेल्वेगाडीची स्वत:ची अशी एक लय असते. गाडीत बसल्यावर थोड्याच वेळात सगळ्यांच्या अंगात नकळत ती लय भिनते. रघूच्याही तारा गाडीच्या तारांशी जुळल्या. थोड्याच वेळात त्याचे डोळे मिटले. गाडीचा ‘ढिडक ढिडक ढिडक ढिडक ढगढगढगढगढग ढिडक ढिडक ढिडक धिडक धिडक...’ हा आवाज मात्र त्याच्या कानात व मेंदूत घुमत राहिला.
अचानक रुळांमधून वेगळाच, काही तरी घासल्यासारखा आवाज येऊ लागलाय, असं रघूला वाटू लागलं. त्यानं डोळे उघडले. कान पुन्हा सीटला लावले. मगाशी येत होता त्यापेक्षा वेगळा आवाज येत होता, असं त्याला जाणवलं. मग त्याला अचानक असं वाटलं, की या रेल्वेमार्गावर पुढं रुळांमध्ये काही तरी बिघाड असला पाहिजे. रुळ कदाचित तुटलेही असतील. मग रघू उठला. त्यानं आजूबाजूला बघितलं. सगळे लोक गाढ झोपले होते. मग रघू खाली उतरला. आता त्यानं डब्याच्या फ्लोअरलाही कान लावला. त्याला पुन्हा तेच जाणवलं. काही तरी गडबड आहे. अशा वेळी चेन ओढून गाडी थांबवायची, हे त्याला माहिती होतं. रघूनं पुढचा-मागचा कुठलाही विचार न करता वर चढून जोरात चेन ओढली. गाडी थांबली. पण विशेष म्हणजे आजूबाजूचं कुणीही जागं झालं नाही. ते लोक, अगदी त्याचे आई-बाबा अगदी गाढ झोपले होते. गाडी एका निर्जन भागात थांबलीय असं लक्षात येत होतं. बाहेर अर्थात दाट अंधार होता. थंडीमुळं धुकंही पसरलं असावं. गाडीतही ते धुकं आलं होतं. त्या धुक्यातून अचानक एक माणूस त्याच्या दिशेनं येताना दिसला. तो माणूस थेट विश्वेश्वरय्यांसारखा दिसत होता. या रेल्वेत दाक्षिणात्य मोटरमन असावा, अशी रघूनं स्वत:ची समजूत करून घेतली. त्या माणसानं रघूला थेट इंग्रजीत विचारलं, ‘व्हॉट हॅपन्ड माय बॉय? व्हाय डिड यू पुल द चेन?’ रघूनं त्याला आलेली शंका सांगितली. तो माणूस चिंतेत पडला आणि लगेच माघारी गेला. थोड्या वेळात त्या डब्यात रेल्वेचे बरेच अधिकारी लोक आले. ‘इथे रघू नावाचा मुलगा कुठे आहे?’ असं त्यांच्यातला एक जण विचारत होता. रघू पुढं झाला. गंमत म्हणजे अजूनही आजूबाजूचे लोक झोपलेलेच होते. त्या अधिकारी माणसानं रघूला सांगितलं, की त्याच्यामुळं या गाडीतील हजार लोकांचे प्राण वाचले आहेत. पुढे एक-दीड किलोमीटरवर खरंच रुळांना तडे गेले होते. त्यामुळं गाडीला मोठा अपघात झाला असता. त्यामुळं आम्ही रघूचं कौतुक करतो आणि त्याचं नाव राष्ट्रपती शौर्यपदकासाठी सुचवतो.
रघूला अतिशय आनंद झाला. पुढच्याच मिनिटात तो राष्ट्रपती भवनात होता. विशेष म्हणजे राष्ट्रपतीही त्या विश्वेश्वरय्यांसारखेच दिसत होते. त्यांनी रघूला शौर्यपदक बहाल केलं. ते घेऊन रघू पळतच बाबांकडं आला. बाबांना पदक दाखवण्यासाठी त्यानं गळ्यापाशी हात नेला, तर पदक नव्हतंच. रघू अतिशय दचकला. पुन्हा पुन्हा गळ्यापाशी, छातीपाशी पदक आहे का, ते चाचपत राहिला. ‘बाबा, पदक गेलं.... पदक हरवलं...’ असं म्हणून रडायला लागला.
‘रघू, रघू... उठ बेटा... कसलं पदक? काय हरवलंय...’ बाबांच्या आवाजानं रघू आता खराखुरा जागा झाला. बाहेर उजाडलं होतं. गाडी वेगानं धावतच होती. रघूनं डोळे चोळत एकदा खिडकीबाहेर आणि एकदा बाबांकडं बघितलं. बाबांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होतं.
‘बाबा, काही नाही झालं. चहा घेऊ या... ’ रघू हसत बाबांना म्हणाला.
‘विचित्रच आहे जरा पोरगं,’ अशा अर्थाचा लूक देऊन बाबा चहावाल्याकडं वळले. इकडं रघूनं सीटला कान लावून पुन्हा एकदा गाडीची लय ऐकली.
‘ढिडक ढिडक ढिडक ढिडक ढगढगढगढगढग ढिडक ढिडक ढिडक धिडक धिडक...’
...ती अगदी ‘नॉर्मल’ होती. पलीकडं उशाशी विश्वेश्वरय्यांचं चरित्र पडलं होतं. रघूला सगळा उलगडा झाला. त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. पुस्तकावरचे विश्वेश्वरय्या आजोबाही त्याच्याकडं बघून मिश्कील हसत आहेत, असा भास त्याला झाला... गाडी वेगानं दिल्लीकडं पळत राहिली...

----

(पूर्वप्रसिद्धी - पासवर्ड दिवाळी अंक २०२२)

---

8 May 2023

महाराष्ट्र शाहीर - रिव्ह्यू

मराठी मातीचा ‘डीएनए’
------------------------------


महाराष्ट्र म्हणजे काय, मराठी माती म्हणजे काय, मराठी माणसाचा ‘डीएनए’ नक्की कसा आहे हे जाणून घ्यायचं असेल तर केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा नवा मराठी चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने बघायलाच हवा. शाहीर कृष्णराव साबळे यांच्या आयुष्यावरील हा ‘बायोपिक’ शाहिरांच्या आयुष्याची कथा तर सांगतोच; पण त्याहून अधिक तो विसाव्या शतकातील महाराष्ट्राचं चित्र आपल्यासमोर मांडतो. आज जातीपातींच्या विद्वेषाने सगळे वातावरण दूषित झालेले असताना तर हा चित्रपट बघणे विशेष गरजेचे आहे, याचे कारण ‘कोण होतास तू, काय झालास तू’ अशी अवस्था मराठी माणसाची झाली आहे. अशा परिस्थितीत आपलं राज्य कसं होतं, इथं काय उंचीची माणसं होऊन गेली, त्यांनी या भूमीसाठी - मराठी मातीसाठी - काय काय केलं हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळं ‘महाराष्ट्र शाहीर’मधला शाहीर साबळेंच्या जगण्याचा प्रवास पाहताना आपल्या राज्याविषयीचा अभिमान दाटून येतो.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून छोट्या किस्नाचा प्रवास दिग्दर्शक दाखवतो. वाईजवळच्या पसरणी गावचे हे साबळे कुटुंब. छोट्या किस्नाला लहानपणापासून गाण्याची आवड असते. वडील शेतकरी. सोबत देवळात कीर्तन करणारे. आईला वाटतं, मुलानं केवळ गाणं म्हणत बसू नये. त्यानं काही पोट भरणार आहे का? भाबडी माउली मुलाला हर प्रकारे गाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असते. मुलगा जरा मोठा झाल्यावर त्याच्या मामाकडं व आजीकडं खानदेशात अंमळनेरला पाठवते. तिथं लहानगा कृष्णा सानेगुरुजींच्या आणि संत गाडगेबाबांच्या सहवासात येतो. तेव्हाचे सगळेच प्रसंग अतिशय हृद्य आहेत. या दोन महापुरुषांच्या सान्निध्यामुळे कृष्णाच्या जगण्याला एक दिशा मिळते आणि तो पुन्हा गावाकडं परततो. तारुण्यात पदार्पण केल्यावर आई कृष्णाला त्याच्या काकासोबत मुंबईला धाडते. काका पुतण्याला गिरणी कामगार म्हणून एका सूतगिरणीत चिकटवतो. कृष्णा गाणं विसरून एक सर्वसामान्य कामगार म्हणून मुंबईत दिवस कंठू लागतो. मात्र, त्याच्या नशिबात काही वेगळंच लिहिलेलं असतं. मुंबईत त्याला पुन्हा एकदा सानेगुरुजी भेटतात. गुरुजी कृष्णाला त्याच्या जगण्याचं प्रयोजन सांगतात. त्यानंतर मात्र कृष्णा एक दृढनिश्चय करून संपूर्ण आयुष्य शाहिरीला, गाण्याला वाहून घेण्याचं ठरवतो. 
त्याच प्रवासात फलटणला एका कॉलेजातील कार्यक्रमात त्याला भेटते भानुमती. भानुमतीला कृष्णाबाबत ‘प्रथमदर्शनीच प्रेमात’ असं होतं. तिच्या आयुष्यात प्रीतीचा मधुमास फुलतो. त्या काळात, १९४२ मध्ये ही मुलगी कृष्णासोबत पळून येते. पसरणीच्या ग्रामदैवताच्या उत्सवात सगळ्या गावकऱ्यांसमोर कृष्णा भानुमतीशी लग्न करतो. ‘बामणाची पोरगी पळवून आणली,’ म्हणून सगळं गाव तोंडात बोट घालतं. नानीची (आई) प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणेच विरोधाची असते. समजूतदार वडील मात्र आशीर्वाद देतात आणि वेगळं बिऱ्हाड करायला सांगतात.
‘माझं काव्य आणि तुमचा आवाज’ मिळून आपण कला क्षेत्र गाजवू, असं भानुमती कृष्णाला सतत सांगत असते. कृष्णालाही तिच्या कलेची कदर असते. मात्र, पुढं गोष्टी बिनसत जातात आणि भानुमती कृष्णापासून दुरावते. कृष्णाचा पुढचा सगळा प्रवास म्हणजे एका साध्या-सुध्या माणसाचं रूपांतर ‘महाराष्ट्र शाहिरा’त होण्याचा प्रवास आहे. केदार शिंदे अत्यंत आत्मीयतेनं आणि कौशल्यानं हा सगळा प्रवास आपल्याला दाखवतात.
शाहीर साबळे एका कार्यक्रमासाठी रशियाला जातात. तिथं पत्रकार त्यांची मुलाखत घेतात आणि फ्लॅशबॅकमधून आपल्याला सगळी कथा उलगडत जाते. चित्रपटाची सुरुवातच ‘आकाशवाणी’वर अय्यर नावाच्या अमराठी अधिकाऱ्याकडून शाहिरांना ‘महाराष्ट्र’ शब्द वारंवार उच्चारू नका, अशा दरडावण्याने होते. त्यानंतर शाहीर रेकॉर्डिंगच्या वेळी काय करतात, हे चित्रपटातच बघायला हवं. 
महाराष्ट्राच्या लोकसंगीतात एक मोठा काळ गाजविणाऱ्या शाहिराचा जीवनपट अडीच तासांत दाखवणं कठीण आहे. मात्र, केदार शिंदे हे आव्हान अतिशय कौशल्यानं पेलताना दिसतात. त्यांच्या आजोबांचाच हा चरित्रपट असल्यानं त्यांची यातली भावनिक गुंतवणूक जाणवते. जोडीला अजय-अतुल यांचं बहारदार संगीत असल्याने चित्रपट बघताना कुठे क्षणभरही कंटाळा येत नाही. 
चित्रपटात काही त्रुटी आहेत. झेंड्याबाबतच्या, तसेच कला दिग्दर्शनातला (त्या काळात नसलेल्या वस्तू दिसणे वगैरे) काही चुका जाणवतात. मात्र, सिनेमाचा वेग चांगला असल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करून कथेत गुंतून राहतो. कास्टिंगबाबत काही त्रुटी जाणवतात. बाळासाहेब ठाकरेंची भूमिका छोटी असली, तरी तो कलाकार बाळासाहेब म्हणून अजिबातच शोभत नाही. तसंच सानेगुरुजींच्या पात्राचं. तुलनेत गाडगेबाबा जमले आहेत.
शाहीर साबळे चरित्रनायक असले, तरी त्यांची ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमा चितारण्याचा मोह दिग्दर्शकाने टाळला आहे आणि त्यांना हाडामांसाचा, आपल्यासारखाच एक माणूस दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे अभिनंदनीय! नाही तर एरवी चरित्रनायक हा इतरांपेक्षा महान दाखवण्याच्या नादात लॉजिकचं भान अनेकदा सुटतं. तसं इथं झालेलं नाही. शाहिरांच्या आयुष्यात आलेल्या आई, भानुमती, मालती कदम आणि मुली चारुशीला व वसुंधरा या सर्व स्त्री-व्यक्तिरेखा विशेष लक्षात राहणाऱ्या झाल्या आहेत. विशेषत: आईची भूमिका करणाऱ्या शुभांगी सदावर्ते यांनी कमाल केली आहे. त्यांना यापूर्वी ‘देवबाभळी’ नाटकात पाहिलं होतं. यात त्यांनी मुलाच्या गाण्याला विरोध करणारी, मात्र त्याचं भलं व्हावं म्हणून सतत झटणारी आणि मुलगा मोठ्ठा शाहीर झाल्यावर आपली चूक सहज कबूल करणारी नानी फार लोभस साकारली आहे.

दुसरं कौतुक करायचं ते सना शिंदेचं. केदार शिंदेंच्या या लेकीनं भानुमतीची तुलनेनं अवघड अशी भूमिका ताकदीनं पेलली आहे. भानुमती यांच्याविषयी मला आधी काहीच माहिती नव्हतं. बहुसंख्य प्रेक्षकांचं तसंच असणार. अशा परिस्थितीत ही भूमिका नकारात्मकतेकडं झुकू न देता, उलट तिच्याविषयी सहानुभूती वाटावी, अशा संतुलित पद्धतीनं रंगवणं हे सोपं काम नव्हतं. मात्र, केदार शिंदेंनी आपल्या लेकीकडून चांगलं काम करवून घेतलं आहे. आजीच्या छोट्याशा भूमिकेत निर्मिती सावंत आपला ठसकेबाज ठसा उमटवून जातात. अंकुश चौधरीनं शाहीर साबळेंची भूमिका अतिशय उत्तमरीत्या साकारली आहे. तरुण वयातल्या कृष्णापासून ते वयोवृद्ध शाहिरांपर्यंतचा या व्यक्तिरेखेचा प्रवास त्याने अभ्यासपूर्ण सहजतेनं उभा केला आहे. अंकुशच्या कारकिर्दीतील ही एक महत्त्वाची भूमिका ठरावी.
सिनेमाचं संगीत अप्रतिम आहे. मला ‘मधुमास’सोबतच ‘गाऊ नको रे किस्ना’ विशेष आवडलं. बाकी सर्व शाहिरी ढंगाची आणि शाहीर साबळेंनी लोकप्रिय केलेली ‘या विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’, ‘मला दादला नको गं बाई’, ‘विंचू चावला,’ ‘हे पावलंय देव माझा मल्हारी’, ‘अंबाबाई गोंधळाला ये’, ‘जेजुरीच्या खंडेराया जागराला या या’, ‘मी तर होईन चांदणी’, ‘या गो दांड्यावरनं’ आदी सगळीच गाणी एक से एक झाली आहेत. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे तर कळसाध्यायाचं गाणं. त्यात मध्येच शाहीर साबळेंचा ओरिजनल ट्रॅक वापरण्याची कल्पना दाद देण्यासारखी! एकूणच या चित्रपटाचं ध्वनिआरेखन आमचे मित्र मंदार कमलापूरकर यांनी भन्नाट केलं आहे.
या चित्रपटात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा संदर्भ आहे. यशवंतराव चव्हाणांसोबतचा एक प्रसंग शाहिरांच्या राजकीय जाणिवेचं दर्शन घडवणारा आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर बाळासाहेब ठाकरेंची व शाहिरांची भेट व त्यातून ‘आंधळं दळतंय’ या तेव्हा अतिशय गाजलेल्या व वादग्रस्त ठरलेल्या नाटकाची निर्मिती हा सगळा प्रवास उत्तरार्धात येतो. रुमादेवी यांच्याकडून कलकत्त्यातील महोत्सवाला आलेलं आमंत्रण आणि तिथं मिळालेल्या जोरदार प्रतिसादानंतर मुली वसुंधरा व चारुशीला यांनी केलेली ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या अजरामर व तुफान लोकप्रिय कार्यक्रमाची निर्मिती हा सगळा भाग आपल्याला उत्तरार्धात दिसतो. 
शाहिरांच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान असलेल्या राजा मयेकरांचा ट्रॅकही व्यवस्थित येतो. राजा बढे व श्रीनिवास खळे यांच्यासोबत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ गाण्याच्या ध्वनिमुद्रणाचा प्रसंगही यात आहे. त्यात शाहीर साबळे हे गाणं शाहीर अमर शेखांच्या आवाजात ध्वनिमुद्रित व्हायला हवं, असं आग्रहानं सांगतात. अर्थात गाणं शेवटी शाहीर साबळेंकडूनच गाऊन घेतलं जातं. अशा अनेक लहान-मोठ्या ऐतिहासिक महत्त्वाच्या प्रसंगांची गुंफण या चित्रपटात आहे. हे संदर्भ ज्यांना ठाऊक आहेत, त्यांना ते बघताना विशेष आनंद होतो. ज्यांना ते माहिती नाहीत, त्यांना त्याविषयी कुतूहल वाटून, त्यांनी महाराष्ट्राचा इतिहास अधिक नेमकेपणानं जाणून घेतला तर ते या सिनेमाचं यश असेल.
आज महाराष्ट्रात सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात अधोगती होताना दिसतेय. राजकीय क्षेत्राचं तर विचारायलाच नको. अशा वेळी सर्व जाती, धर्म, प्रादेशिक वाद या सर्वांपलीकडे जाऊन मराठी मातृभाषा असणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाला हात घालण्याची ताकद असणारा एक मोठा लोकशाहीर आपल्या भूमीत होऊन गेला, हे सर्वांना माहिती असायला हवं. त्या जोडीला आपलं हे राज्य नक्की कोणत्या मुशीतून घडलंय, आपला वारसा नक्की कोणता आहे, आपल्या मराठी मातीचा ‘डीएनए’ काय आहे याचा थोडा फार अंदाज या कलाकृतीतून येतो. त्यामुळे सर्व मराठी माणसांनी, विशेषत: आपल्या पुढच्या पिढीला घेऊन हा चित्रपट नक्की बघायला हवा.

----

दर्जा - साडेतीन स्टार

---

27 Apr 2023

गोवा ट्रिप १५-१९ एप्रिल २३ - उत्तरार्ध

लोभस हा ‘गोवालोक’ हवा...
--------------------------------


गोव्यात आलो आहे आणि बा. भ. बोरकरांची आठवण आली नाही, असं शक्यच नाही. कोलवा बीचवरच्या त्या संध्याकाळचा सुंदर सूर्यास्त बघत असताना, ‘माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या-कपाऱ्यांमधुन घट फुटती दुधाचे; माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या-फणसांची रास, फुली फळांचे पाझर, फळी फुलांचे सुवास’ या ओळी आठवल्याच. त्या बीचवर सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या सगळ्या जीवांची अवस्था बोरकरांच्याच शब्दांत ‘सुखानेही असा जीव कासावीस’ अशीच झाली असणार, यात शंका नाही.
आमच्या पोरांना तिथं तिथं वॉटर स्पोर्ट, ते पॅरासेलिंग करायचं होतं. मात्र, सूर्यास्तानंतर तिथं एक पोलिसांची गाडी आली आणि त्यांनी सगळ्यांना रास्तपणे पाण्याबाहेर काढलं. मग आम्हीही दुसऱ्या दिवशी परत येऊ, असं म्हणत तिथून निघालो. तिथं बाहेर आलो, की एक ‘सागरकिनारा’ नावाचं उडुपी हॉटेल होतं. पोरांना काही तरी खायचं होतंच. मग मंदार सगळ्या मुलांना घेऊन तिथं गेला. आम्ही तिथल्या बाहेरच्या दुकानांत शॉपिंग करत हिंडत राहिलो. तिथून आमच्या व्हिलाला परत जायचं कसं, हा एक प्रश्नच होता. तिथं रिक्षा किंवा टॅक्सी फारशा दिसत नव्हत्या. आपल्याकडे शहरात कसं, नऊ-साडेनऊ वाजले तरी फार काही उशीर झालाय असं वाटत नाही. तिथं मात्र लगेच सामसूम व्हायला सुरुवात होते. बीचच्या अगदी जवळचा परिसर तेवढा दुकानांमुळं जागता होता. आम्ही काजू वगैरे आवश्यक खरेदी करून टाकली. पोरांचं खाणं झाल्यावर आम्ही टॅक्सी शोधायला लागलो. सुदैवानं फार वाट बघावी लागली नाही. लगेच दोन टॅक्सी मिळाल्या आणि आम्ही पहिल्या दिवशी सुखरूप आमच्या व्हिलावर पोचलो. रात्रीचं जेवण तिथंच सांगितलं होतं. फार भूक नव्हती, तरी डाल-राइस सगळ्यांनीच खाल्ला. नंतर यजमानांकडून अत्यंत उत्कृष्ट असं होममेड आंबा आइस्क्रीम मिळालं आणि दिवसभराचा शीण पळून गेला. नंतर निवांत गप्पा मारत बसलो. पहिल्या दिवशीच्या शिणवट्यामुळं लगेच झोप लागली.
दुसऱ्या दिवशी मंदार, अभिजित व सगळे बेतालबाटिमच्या, हां - ‘वेताळभाटी’च्या - बीचवर गेले. हा बीच तुलनेनं जवळ, म्हणजे दोन किलोमीटरवर होता. आम्ही तिघं मात्र उशिरापर्यंत झोपलोच होतो. त्यामुळं गेलो नाही. तसंही समुद्राच्या पाण्यात खेळायचा आम्हाला फार सोस नाहीच. जवळपास तीन तासांनी हे सगळे भरपूर खेळून परत आले, तेव्हा जवळपास दहा वाजले होते. तोवर आमचं सगळं आवरून झालं होतं. आज ब्रेकफास्टला पोहे, फळं आणि नंतर चहा-कॉफी असं होतं. ब्रेकफास्ट झाल्यानंतर सकाळी समुद्रात खेळून दमलेली मंडळी विश्रांतीला गेली. त्यामुळं आम्हीही जरा निवांतच होतो. मि. गोडबोले बाहेरगावी गेले होते, ते आज सकाळी परत आलेले दिसले. त्यांच्याशी ओळख झाली. त्यांच्याकडे टाइम्स ऑफ इंडिया व लोकमत हे दोन पेपर येत असल्यानं माझी सोय झाली. आम्ही खरं तर पणजीला एक दिवस जायचा विचार काल केला होता. मात्र, काल पेपरमध्ये कळलं होतं, की पणजीत १७ ते १९ एप्रिल या काळात जी-२० ची परिषद भरते आहे. त्यामुळं तिथं बऱ्यापैकी बंदोबस्त असणार होता. पर्यटनस्थळं खुली असतील की नाही, याची कल्पना नव्हती. म्हणून मनस्विनीला फोन लावला. ती मसुरीत होती. मात्र, तिनं तिकडून फोनाफोनी करून सांगितलं, की स्ट्रीट मार्केट वगैरे सगळं बंद ठेवलं आहे. मांडवी नदीतील क्रूझ पण रविवारी बंद होत्या. पण आज, म्हणजे सोमवारी त्या चालू असतील. पण आम्ही राहत होतो, तिथून दोन टॅक्सी करून पणजीला केवळ त्या क्रूझसाठी जाणं काही व्यावहारिक नव्हतं. शिवाय गोव्यात अन्य वेळी बाकी सर्व ठिकाणं तशी बघून झालीच होती. अगदी दहा वर्षांपूर्वी आम्ही सगळ्यांनी ती क्रूझ राइड केलीच होती. या वेळी जरा निवांतपणा हवा होता. म्हणून पण पणजीला जाणं सर्वानुमते रद्दच केलं. दुपारचं जेवण ‘कोटा कोझिन्हा’मध्ये करायचं हे ठरलंच होतं. मग दुपारी परत तिकडं गेलो. रस्त्यातच मालकीणबाई दिसल्या. कुणाच्या तरी दुचाकीवरून कुठे तरी निघाल्या होत्या. ‘आलेच’ या टाइपचं काही तरी बोलल्या आणि भुर्र निघून गेल्या. आज गर्दी कमी होती. त्यामुळं आज आतमध्ये बसायला मिळालं. मुख्य जेवण सोडल्यास आज कालचीच ऑर्डर ‘रिपीट’ होती. थोड्या वेळातच मालकीणबाई परत आल्या आणि पुन्हा आमची सरबराई करू लागल्या. त्यांच्या ‘व्यवसायचातुर्याला’ यश आलं आणि कालच्यापेक्षा आज बिल थोडं जास्तच आलं! भरपेट जेवण झाल्यावर फोटोसेशनही झालं. इथून आम्हाला ते ‘बिग फूट म्युझियम’ बघायला जायचं होतं. टॅक्सी लवकर मिळेना. पण अखेर दोन टॅक्सी बुक झाल्या व आम्ही त्या संग्रहालयाकडे रवाना झालो. मडगाव शहरावरून आम्ही लोटली या ठिकाणी गेलो. अंतर आठ किलोमीटर असलं, तरी इथं ते नेहमीच जास्त वाटलं. तसंच आत्ता येतानाही वाटलं. 

हे ‘बिग फूट संग्रहालय’ म्हणजे कुणा एका महात्म्याचं (नाव विसरलो) उमटलेलं मोठं पाऊल. त्यावरून हे नाव दिलंय. त्या महात्म्याची गोष्ट सांगणारा एक व्हिडिओही तिथं दाखवतात. ते मोठं पाऊलही तिथं जतन करून ठेवलंय. तिथं चर्चप्रमाणे उदबत्त्या वगैरे लावतात. त्या बाहेर विकायलाही होत्या. हे संग्रहालय म्हणजे आपल्याकडे पंढरपूरला कैकाडी महाराज मठ किंवा कोल्हापूरजवळचा कण्हेरी मठ किंवा हाडशीमधलं संग्रहालय आहे, तसंच आहे. प्राचीन काळापासूनचा गोव्याचा इतिहास तिथं मांडला आहे. पुतळे चांगले होते. फोटो काढायला भरपूर संधी होत्या. तिथं दोन छोटी दुकानंही होती. तिथल्या संभाषणचतुर बायकांमुळे आम्ही तिथंही भेटवस्तूंची खरेदी केलीच. जवळपास तासभर तिथं गेला. मग बाहेर येऊन सरबत प्यायलो तेव्हा बरं वाटलं. आमचे टॅक्सीवाले तिथंच थांबले होते. (ते तसे थांबणार याचा अंदाज होताच.) मग त्यांनी आम्हाला कोलवा बीचला सोडलं. काल राहिलेलं पॅरासेलिंग आज करायचंच होतं. मंदार, नील, निमिष, सेतू या चौघांनी एकापाठोपाठ एक पॅरासेलिंग केलं. आम्ही आपलं खालून त्यांचं शूटिंग केलं. (मी व धनश्रीनं फार पूर्वी दिवेआगरला केलं होतं. तेव्हा मंदार फॅमिलीसोबत गेलो होतो.) नील ते करून आल्यावर फारच ‘एक्साइट’ झाला होता. मजा आली. आज सोमवार असल्यानं बीचवर कालच्या तुलनेत गर्दीही कमी होती. आम्ही निवांत बसलो मग! सूर्यास्त झाल्यावर निघालो. आजही तिथं बाहेरच्या दुकानांत शॉपिंग केलं. विशेषत: आमच्या दोन छोट्या जुळ्या पुतण्या-पुतणीला खास ते ‘आय लव्ह गोवा’ वगैरे लिहिलेले ड्रेस घेतले. तिथं एक उसाचा रस विकणारा गाडा होता. तो रस प्यायल्यावर मस्त वाटलं. नंतर आम्ही सगळेच ‘सागरकिनारा’ला गेलो. सँडविच, डोसे, चहा असं सगळं हादडून बाहेर पडलो. टॅक्सी मिळायला फार त्रास झाला नाही. मग लगेच व्हिलावर परतलो. आजही जेवण तिथंच सांगितलं होतं. निवांत रात्रीचं जेवण झालं. रात्री परत गप्पा, पत्ते यात कसा वेळ गेला कळलंही नाही.
तिसऱ्या दिवशी सकाळी ही सगळी मंडळी पुन्हा ‘वेताळभाटी’च्या बीचवर जाणार होती. फक्त अभिजित थांबणार होता, कारण त्याचं काही काम बाकी राहिलं होतं. मग आम्ही लवकर आवरून सगळेच बाहेर पडलो. श्वानमंडळी आमच्या स्वागताला प्रत्येक घराबाहेर उभी होतीच. त्यांच्या भुभुकाराच्या गजरात आम्ही त्या बीचवर पोचलो. बीच अगदीच काही जवळ नव्हता. आम्ही पोचेपर्यंत आठ वाजले होते. सगळे जण पाण्यात खेळले. मी व धनश्री बीचवरच थांबलो. थोड्या वेळानं नीलही कंटाळला. मग आम्ही तिथं जरा आधी तिथून निघालो. हातात काठी घेऊन दोन किलोमीटर परत चालत आलो. सकाळची वेळ असली तरी ऊन व दमट हवेमुळं चांगलीच दमछाक झाली. आल्यावर शॉवर घेणं मस्टच होतं. बाकी मंडळी जरा वेळानं परत आली. मग एकत्र ब्रेकफास्टला जमलो. आज ब्रेकफास्टला उपमा होता. मि. गोडबोलेंनी त्यांच्या अंगणातल्या काजूच्या मोठ्या झाडाचे काजू बोंड काढून ते कापून आम्हाला खायला दिले. मी पहिल्यांदाच खाल्ले. रसाळ, आंबटतुरट अशी वेगळीच चव होती.
आज आमचा निघायचा दिवस होता. ‘चेकआउट’ची वेळ दहा असली, तरी आमची ट्रेन दुपारी असल्यानं आम्हाला बारा वाजेपर्यंत थांबायला परवानगी मिळाली होती. सगळं आवरून होईपर्यंत बारा वाजलेच. दुपारच्या जेवणाचा प्रश्न होता. ‘कोटा कोझिन्हा’ मंगळवारी बंद असतं. मग गोडबोलेंनी आम्हाला तिथं असलेलं ‘फिश्का’ हे दुसरं हॉटेल सुचवलं. आम्ही सामान तिथंच ठेवून जेवून यावं, मग टॅक्सी बोलवावी असं त्यांनी सांगितलं. हे आम्हाला सोयिस्कर होतं. मग पुन्हा एकदा आमची वरात चालत चालत (कुत्र्यांचा सामना करत, हे आता सांगायला नको!) ‘फिश्का’ हॉटेलमध्ये पोचली. ते हॉटेल उघडं असलं, तरी तिथं अक्षरश: एकही ग्राहक नव्हता. आम्हीच आधी पोचणारे. पण निवांत, साग्रसंगीत जेवण झालं. हे हॉटेल ‘कोटा’पेक्षा थोडंसं महागही होतं. पण वेळेला जेवण मिळालं, हे काय कमी म्हणून आम्ही पुन्हा पदयात्रा करत व्हिलावर आलो.
आता निघायची वेळ झाली होती. नेहमीप्रमाणे दोन टॅक्सी बुक केल्या. एक टॅक्सी पुढं गेली. दुसऱ्या टॅक्सीत अभिजित, निमिष, मी, धनश्री व नील जाणार होतो. अभिजितनं बुक केलेली टॅक्सी आली. मात्र, त्यानं आल्या आल्या ‘फक्त चार प्रवासी नेणार, तुम्ही पाच जण आहात,’ असा पवित्रा घेतला. आम्ही बुचकळ्यात. गेले दोन दिवस आम्ही बाकी सगळ्या टॅक्सींतून पाच जणच गेलो होतो. त्यात आमच्यात दोन तशी लहान मुलं होती. गोडबोले दाम्पत्यानंही बाहेर येऊन मध्यस्थी केली. मात्र, तो टॅक्सीवाला काही हटेना. बाहेर पोलिसांनी पकडलं, तर जबाबदारी कोण घेणार, असं सारखं विचारत होता. माझ्या डोक्यात एकदम ट्यूब पेटली. याचं व पोलिसांचंच साटंलोटं असणार. हा बाहेर नेऊन पोलिसांसमोर गाडी उभी करणार. आम्हाला दोन किंवा तीन हजारांचा दंड पोलिस लावणार. त्यात याचा वाटा असणार! मी ताडकन आमच्या बॅगा काढून घेतल्या व त्याला म्हटलं, आप चले जाओ. हमें नहीं चाहिए आप की टॅक्सी! त्यावर तो भाई जरासा आश्चर्यचकितच झाला. त्याला ही प्रतिक्रिया अपेक्षित नसावी. मग जरा तणतणतच तो निघून गेला. आम्ही दुसऱ्या टॅक्सीच्या शोधाला लागलो. रविवारी आम्हाला सोडणाऱ्या टॅक्सीवाल्याचा नंबर माझ्याकडे होता. त्याला फोन लावला. तो मराठी होता. लगेच येतो म्हणाला. मी पैसे विचारले. ‘पाचशे’ असं तो म्हणाला. (किंवा मला तसं ऐकू आलं...) मी लगेच ये म्हटलं. आमचे यजमान खूप चांगले होते. टॅक्सी मिळाली नाही, तर मी तुम्हाला गाडीने स्टेशनला सोडतो, असं मि. गोडबोलेंनी सांगितलं होतं. त्यामुळं आम्ही तसे निर्धास्त होतो. आमची ट्रेन साडेतीन वाजता होती. अखेर दोन चाळीसला मी फोन केलेला टॅक्सीवाला उगवला. आम्ही लगेच सामान टाकलं आणि निघालो. त्यानं आडवाटेनं, कुठून कुठून पळवत तीन वाजून पाच मिनिटांनी मडगाव स्टेशनला गाडी आणली. पाचशे रुपये दिले, तर ‘आठशे’ झाले म्हणाला. मला तरी तो आधी फोनवर ‘पाचशे’च म्हणाल्याचं आठवत होतं. मग आता पर्याय नव्हता. अडचणीच्या वेळी तो आला होता, हे खरं होतं. त्यामुळं आम्ही फार वाद न घालता त्याला आठशे रुपये देऊन टाकले.

स्टेशनमध्ये मंदार व बाकी सगळे आमची वाटच पाहत होते. थोड्याच वेळात ट्रेन आली आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. ट्रेन फक्त अर्ध्या तासापूर्वी वास्कोतून सुटल्यामुळे आता इथं स्वच्छता होती. आमच्यातले तीन नंबर एकदम वेगळ्याच डब्यात (तीन डबे सोडून) आले होते. मग अभिजित, हर्षदा व निमिष तिकडं गेले. आम्ही सहा जण पहिल्या डब्यात बसलो. अर्थात सगळे डबे जोडलेले असल्यानं आम्ही ये-जा करतच होतो. गोवा एक्स्प्रेस ही दक्षिण-पश्चिम रेल्वेकडून चालविली जाते. या विभागाचं मुख्यालय आहे हुबळी. आत्ता गाडी त्या हद्दीतूनच जात असल्यामुळं इथं तैनात एकदम जोरदार होती. एक इन्स्पेक्टर बाई गाडीतून सिंगल प्रवासी असलेल्या महिलांची चौकशी करून गेल्या, तेव्हा तर मला भरूनच आलं. बाकी सतत झाडलोट, स्वच्छता हे सुरू होतं. या वेळचे बेडशीट, ब्लॅंकेट आदीही जरा बरे होते. सतत खायला येत होतं. मग आम्ही भेळ खाल्ली. नंतर घाट सुरू झाला, तर आम्ही पुन्हा दाराशी जाऊन उभे राहिलो. पण ‘दूधसागर’ कधी गेला ते कळलंच नाही. ही गाडी लोंडा नावाच्या जंक्शनला बराच वेळ थांबते. इंजिन पुढचे काढून मागे जोडले जाते. प्रवासाची दिशा बदलते. पूर्वी हुबळीवरून निजामुद्दीनला जाणारे दोन डबेही याच स्टेशनात या गाडीला जोडले जायचे. आताही जोडले जातात का माहिती नाही. आमची गाडी या स्टेशनवर थांबल्यावर आम्ही निवांत खाली उतरून फोटो वगैरे काढले. अर्ध्या तासानं गाडी बेळगावच्या दिशेनं हलली. हळूहळू रात्र झाली. गाडी साडेसात वाजता बेळगावात पोचणार होती. मला बेळगावला जाऊन आता २३-२४ वर्षं झाली. मला ते मस्त गाव पुन्हा बघायचं होतं. मी पुन्हा दारात येऊन थांबलो. सुंदर थंड हवा होती. एसीपेक्षा बरं वाटत होतं. आकाश निरभ्र होतं. सगळे ग्रह, तारे दिसत होते. मुलांना ते आकाशदर्शन घडवलं. हळूहळू गाडी बेळगावच्या हद्दीत शिरत होती. सर्व शहर आता संध्याकाळच्या दिव्यांनी झगमगत होतं. बेळगाव आलं, की ‘रावसाहेबां’ची आठवण येणं अपरिहार्य होतं. त्यांचं ते रिट्झ थिएटर, आर्ट सर्कल, ते राणी पार्वती कॉलेज इथंच कुठे तरी असणार... मी आत्ताच्या त्या आधुनिक, झगमगीत शहरात साठ सालचं बेळगाव शोधायचा निरर्थक प्रयत्न करत होतो. बेळगाव म्हटलं, की आणखी लंपनची आठवणही होणारच. अगदी एक हजार नऊशे अडुसष्ट वेळा... तंतोतत! (आमचा निपुण ‘लंपन’ आता पडद्यावर आणतोय. फार उत्सुकता आहे तो बघायची...)
बेळगाव स्टेशनात गाडी थांबली. स्टेशनही चकाचक होतं. एकदाच जाऊनही मी या गावाच्या प्रेमात आहे. त्यामुळं बेळगाव सोडून गाडी पुढं निघाली तसं उगाच हुरहुर वाटायला लागली. मग घटप्रभा, रायबाग, कुडची वगैरे स्टेशनं घेत मिरजला, म्हणजे महाराष्ट्रात आली. इथं आलं की आपण ‘आपल्या एरिया’त आलो, असा फील येतोच. अर्थात याही वेळी खाली उतरलो नाही. रात्री ट्रेनमधलं जेवण घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मग ते मागवून जेवलो आणि झोपलो सरळ! पहाटे पावणेचारचा गजर जवळपास प्रत्येकानं लावला होता. पुण्याला बरेच लोक उतरणार असल्यानं त्या सुमारास बरीच जाग आली गाडीला. गाडी अगदी वेळेत म्हणजे पहाटे सव्वाचारला पुण्यात पोचली.
ओला-उबरची टॅक्सी बुक करायला लागलो तर एकही टॅक्सी आत येईना. आतल्या रिक्षावाल्यांची दादागिरी! ते या ओला-उबरवाल्यांकडून अनधिकृतपणे ५० रुपये वसूल करतात. खंडणीच ही! मग आम्ही बाहेर जाऊन एक कॅब बुक केली. तोही शहाणा. केलेलं बुकिंग रद्द करा आणि ते पैसे मला द्या, म्हणायला लागला. ‘अडला हरी...’ या न्यायाने आम्ही ‘बरं बाबा, सोड एकदाचं आम्हाला घरी’ असं म्हणालो आणि पुढच्या पाऊण तासात घरी पोचलो. घरी पोचल्यावर आपल्या बेडवर पाठ टेकवून पडल्यावर जे सुख झालंय म्हणता, त्याची कुठं तुलनाच नाही! 
अर्थात तीन-चार दिवसांचा ‘जिवाचा गोवा’ केल्यावर हा गारवा येणारच होता. पुन:पुन्हा गेल्या चार दिवसांतली स्मरणचित्रं डोळ्यांसमोरून सरकत होती आणि आवडत्या बाकीबाब यांच्या ओळीही स्मरत होत्या - 

स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा
तृप्ति नको मज मुक्ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा

---

(समाप्त)

---

याआधीच्या गोवा ट्रिपवरचा ब्लॉग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-----

26 Apr 2023

गोवा ट्रिप १५-१९ एप्रिल २३ - पूर्वार्ध

गोवा... आनंदाचा ठेवा...
-----------------------------------------------------


ऐन एप्रिलमध्ये, रणरणत्या उन्हात गोव्याला जाण्यामागं माझं तसंच सबळ कारण होतं. मी गोव्याला पहिल्यांदा गेलो, ते २००३ मध्ये हनीमूनला. आमचं लग्न झालं २५ मार्च २००३ ला आणि मी व धनश्री त्यानंतर चार-पाच दिवसांनी नगरवरून गोवा एक्स्प्रेसने गोव्याला गेलो होतो. त्यानंतर दहा वर्षांनी, म्हणजे फेब्रुवारी २०१३ मध्ये आम्ही पुन्हा गोव्याला जायचं ठरवलं, तेव्हा पेंढारकर व मंदार फॅमिली आम्हाला जॉइन झाली. आमची मुलं तेव्हा बरीच लहान, म्हणजे ८-१० वर्षांची होती. तेव्हा आम्ही कळंगुटला ‘कामत हॉलिडे होम्स’मध्येच (जिथं दहा वर्षांपूर्वी आम्ही राहिलो होतो, तिथंच) राहिलो. या ट्रिपला आम्हाला फारच धमाल आली होती. म्हणून मग बरोबर दहा वर्षांनी पुन्हा गोव्याला जायचं ठरवलं आणि स्वाभाविकच हाच सीझन निवडावा लागला. मागच्या दोन्ही वेळी गोवा एक्स्प्रेसनं गेलो होतो, म्हणून या वेळीही मुद्दाम चार महिने आधी (मुलांच्या परीक्षा संपल्यानंतरच्या) ट्रिपच्या तारखा फायनल केल्या आणि ट्रेनची तिकिटं काढली.
आम्ही मडगावपर्यंत जाणार होतो, त्यामुळं त्या शहराच्या आसपास कुठं होम स्टे मिळतोय का, हे आम्ही शोधायला लागलो. आमची मैत्रीण मनस्विनी (प्रभुणे) ही आमची गोव्याची ‘सिंगल पॉइंट काँटॅक्ट पर्सन’ आहे. त्यामुळं तिलाच साकडं घातलं. तिच्या ओळखीतून बाणवलीतील ‘अगस्त्य व्हिला’ची माहिती समजली. मूळ पुण्यातल्याच गोडबोले दाम्पत्याची ही प्रॉपर्टी आहे. मी प्रणाली गोडबोले यांना फोन केला, तर त्यांनी आमच्या तारखांना बुकिंग फुल्ल असल्याचं (गोड बोलून) सांगितलं. मी फारच निराश झालो. याचं कारण त्यांचा हा व्हिला मडगाव स्टेशनपासून फक्त आठ किलोमीटरवर होता. आमच्याकडं स्वत:च्या गाड्या नव्हत्या आणि आम्ही एकूण दहा लोक होतो. त्यामुळं दर वेळी टॅक्सी करावी लागणार होती. म्हणून अंतराचा विचार करावाच लागणार होता. मला काय वाटलं, माहिती नाही; पण मी पुन्हा गोडबोले बाईंना फोन केला आणि म्हटलं, बघा की, काही जमतंय का! एक-दोन दिवसांत त्यांचा उलट मेसेज आला, की आधी ज्यांनी बुकिंग केलं होतं, त्यांना विनंती केली की एक आठवडा पुढं ढकलता येईल का? आणि ते लोक तयार झाले, तर तुम्हाला बुकिंग मिळू शकेल. व्वा व्वा! मला फारच आनंद झाला. आम्ही लगेच त्यांच्याकडं बुकिंग करून टाकलं. 
गोवा एक्स्प्रेस ही गाडी माझी फार आवडती. एके काळी या गाडीचा फार दिमाख होता. आम्ही जर्नालिझमचे विद्यार्थी म्हणून दिल्ली ट्रिपला गेलो होतो ते याच गाडीनं. ही गाडी पुण्यात फार ऑड वेळेला, म्हणजे पहाटे सव्वाचार वाजता येते. मला आठवतंय, आम्ही सर्व विद्यार्थी रात्री बारा वाजताच स्टेशनवर पोचलो होतो आणि ही ट्रेन येईपर्यंत भयंकर दंगा केला होता तिथं. अतिच उत्साह होता अंगात... वर उल्लेख आला आहे, तसं वीस वर्षांपूर्वी हनीमूनला गेलो होतो ते याच ट्रेननं. तेव्हा ही गाडी प्रीमियम सुपरफास्ट श्रेणीत होती आणि अजिबात लेट नसायची. डबे व इतर व्यवस्थाही स्वच्छ, नेटकी असायची. गोव्याला जाण्यासाठी ही गाडी पुण्यात दुपारी पाच वाजता येते. हल्ली ॲपमुळं गाडी किती लेट आहे वगैरे ते नेमकं कळतं. आम्ही निघायच्या दिवशी ही गाडी एक ते दीड तास लेट पुण्यात येत आहे, असं दिसत होतं. अर्थात तरी आम्ही गाडीच्या वेळेला म्हणजे पाच वाजताच पुणे स्टेशनला येऊन पोचलो. गाडी अपेक्षेप्रमाणे लेट होती. सात वाजता येणार होती. मग एसी वेटिंगरूममध्ये (तासाला माणशी दहा रुपये दर) जाऊन बसलो. स्वाभाविकच पोरांना व पोरांच्या बापांना भुका लागल्या. मग स्टेशनवरच पाकीट हलकं व्हायला सुरुवात झाली. अर्थात एकदा ट्रिपला जायचं व मजा करायची म्हटल्यावर पैशांचा विचार करायचा नसतो. ‘होऊ दे खर्च’ हाच बाणा ठेवायचा असतो. अखेर सात वाजता ट्रेन आली. गाडीला भरपूर गर्दी होती. गाडीची पूर्वीची शान गेल्याचं जाणवलं. ‘थ्री टिअर एसी’त आमचे बर्थ होते. तिथं रिझर्वेशन असलेलेच लोक बसू शकतात, त्यामुळे गर्दी असली तरी निदान त्रास नव्हता. बुकिंग करताना सर्व दहा सीट एकत्र कधीच मिळत नाहीत. याचं कारण बुकिंग करताना जास्तीत जास्त सहा जणांचं एकत्र बुकिंग करता येतं. पुढची चार तिकिटं वेगळी बुक करावी लागतात. तोवर मधल्या सीट बुक झालेल्या असतात. त्यामुळं डब्यात शिरल्यावर प्रत्येक जण दुसऱ्याबरोबर हा सीट अदलाबदलीचा उद्योग करत असतो. आम्हीही तो केला आणि एकदाचे स्थिरस्थावर झालो. ट्रेनमधलं जेवण हा एक भयावह प्रकार असतो. त्यामुळं आम्ही जेवण घरूनच आणलं होतं. गप्पा, पत्ते, जेवणखाण यात भराभर वेळ गेला. रात्रीचे नऊ वाजले, की ट्रेनमधल्या खालच्या सीटवर बसलेल्या लोकांना एकदम इसाळ येतो. ते धाडधाड बर्थ पाडून झोपायच्या तयारीला लागतात. अशा वेळी आपल्याला इलाजच नसतो. आम्हीही गपगार आपापल्या बर्थवर जाऊन पडलो. मधला बर्थ लावणे, त्यावर त्या बेडशीट घालणे, इष्ट ब्लँकेट मिळविणे हा एक सोहळा असतो. तो सगळ्यांचा पार पडला. त्यात पोरांना अचानक बर्थ बदलावेसे वाटतात. कुणाला पंखा सुरू हवा असतो, तर कुणाला बंद! कुणाला दिवा हवा असतो, तर कुणाला गुडुप्प अंधार! रेल्वेच्या त्या एका विशिष्ट लयीत सतत आपलं अंग हलत असतं. एकूणच मला हे सगळं फार मस्त वाटतं. त्यात कुठल्या तरी स्टेशनला गाडी थांबली, की त्या स्टेशनला आपले पाय लागलेच पाहिजेत, अशा अहमहमिकेनं खाली उतरणारे महात्मे असतात. मीही एके काळी तसाच होतो. आता ते उद्योग फार करत नाही. तरी खालच्या खिडकीतून बाहेर बघण्याचा खटाटोप सुरूच असतो. आपण झोपेची आराधना सुरू केली, की खालचे घोरासुर एकसुरात घोरायला लागतात. मी इतके ट्रेन प्रवास केले, पण आपल्या कंपार्टमेंटमध्ये घोरणारा माणूस नाही, असं एकदाही झालेलं नाही. ट्रेनच्या आवाजाच्या वरताण आवाजात हे घोरासुर ढाराढूर झोपेत घोरत असतात आणि आपल्याला घोर लावत असतात. अशा वेळी सरळ इअरफोन कानात खुपसायचे आणि आपली आवडती मालिका बघायची. मी ‘वागले की दुनिया’चा एपिसोड बघून टाकला आणि घोरासुरांना पराजित केलं. नंतर अशी एक वेळ येते, की आपल्याला झोप लागतेच.... तसाच मीही झोपेच्या स्वाधीन झालो.
सकाळी जाग आली, तेव्हा गाडी अजून कॅसलरॉक आणि दूधसागर स्टेशनांच्या मधेच होती. पहाटे ५.४० ही गाडीची मडगावला पोचण्याची नियोजित वेळ. मात्र, पुण्यापासून झालेला विलंब कायम होता आणि आता ही गाडी सकाळी आठ वाजता मडगावला पोचणार होती. आम्हाला हे एका अर्थानं सोयीचंच होतं. भल्या पहाटे मडगावला उतरून तरी काय करायचं होतं? मग डब्याच्या दारात येऊन उभा राहिलो. हा घाट उतरताना दोन्ही बाजूंना सह्याद्रीचं विलोभनीय दर्शन घडतं. ‘दूधसागर’ धबधब्याचंही दर्शन घडलं. अगदी थोडासा का होईना, पण वाहता धबधबा होता. चालत्या ट्रेनमधूनही फोटो चांगला मिळाला. गाडी घाटाखाली आली आणि वातावरणातला बदल एकदम जाणवू लागला. दमट हवा आणि ऊन हे कॉम्बिनेशन बेकार होतं. सकाळी बरोबर आठ वाजता मडगाव स्टेशनवर पोचलो. आता आम्हाला टॅक्सी करूनच बाणवलीला जायचं होतं. तिथं एक बरं होतं. प्री-पेड टॅक्सी स्टँड होतं. तिथं आम्ही टॅक्सी बुक केल्या आणि निघालो. तिथंही घासाघीस करून शंभर रुपये कमी करायला लावले. पण एकूणच गोव्यात टॅक्सी महाग. प्रणाली गोडबोलेंना फोन केल्यावर कळलं, की त्यांचा व्हिला बाणवलीत नव्हे, तर ‘बेतालबाटिम’मध्ये आहे. बेतालबाटिम म्हणजे मूळचं नाव वेताळभाटी. पण गोव्यात पोर्तुगीजांनी सर्व देशी नावांची, पुढे ‘म’ लावून वाटम् लावूनम् टाकलीम् आहेम्. बाणवलीचं काय तर म्हणे बेनोलिम... त्यामुळं मूळ मराठी किंवा गोवन नावं शोधणं हे एक दिव्यच. ते एक असो. 
मडगाव स्टेशनपासून आमचा व्हिला आठ किलोमीटर असला तरी मध्ये निर्जन भाग लागत असल्याने आपण लांब कुठं तरी जातोय असं वाटत राहतं. तसं ‘बराच लांब प्रवास करून’ एकदाचे आम्ही आमच्या ‘अगस्त्य व्हिला’त दाखल झालो. तिथं गोडबोले बाईंसह त्यांच्या स्कॉट, कोको आणि एंजल या तीन कुत्र्यांनीही आमचं ‘भुभुकारा’सह स्वागत केलं. मी आणि धनश्री एकूणच प्राण्यांपासून दूर राहणारे! याबाबत ‘पाळीव प्राणी’मध्ये पु. लं.नी सांगितलेलं मत अगदी पटतं. पण आमच्यातले निमिष आणि शुभवी हे भलतेच प्राणीप्रेमी. ते आल्या आल्या या श्वानकुलाच्या गळ्यातच पडले. आमची चिंता मिटली. (मात्र, पुढच्या वेळी व्हिला बुक करताना तिथं ही जमात आहे का, याची आधी चौकशी करायला हवी, हे मनात ठरवून टाकलं.) बाकी हा व्हिला उत्तम आहे. पोर्तुगीज शैलीतलं त्याचं बांधकाम अतिशय आकर्षक आहे. आमच्या खोल्याही प्रशस्त होत्या. खाली दोन व वरच्या मजल्यावर दोन. आम्ही कुत्र्यांचा विचार न करता, खालची खोली घेतली. खोल्या एसी असल्यानं बाहेरच्या उकाड्याचा त्रास नव्हता. तिन्ही दिवस ब्रेकफास्टची सोय तिथंच होती. पहिल्याच दिवशी गोडबोलेंनी आम्हाला भाजी-पाव, मंगळुरी बन्स असा गोवन ब्रेकफास्ट दिला. आम्ही त्यावर अगदी तुटून पडलो. मग तिथंच एकत्र गप्पा मारत बसलो. दुपारच्या जेवणासाठी जवळच ‘कोटा कोझिन्हा’ नावाचं हॉटेल होतं. तिथं सगळे गेलो. या हॉटेलच्या गोवन मालकीणबाई फारच भारी होत्या. त्यांनी आमच्याजवळ येऊन प्रत्येकाला हे ट्राय करा, ते ट्राय करा असं सांगितलं. रविवार असल्यानं हॉटेलात गर्दी होती. पण आम्ही दहा जण असल्यानं अंगणात आमच्यासाठी वेगळं टेबल लावण्यात आलं. दुपारची उन्हाची वेळ असल्यानं आम्ही सगळ्यांनीच शरीर थंड करणारी विविध पेयं घेतली. आमच्यातले बहुसंख्य शाकाहारी. ते जेवण तिथं नीट मिळतंय की नाही, याची जरा शंका होती. पण उत्तम पंजाबी व्हेज जेवण मिळालं. मुळात स्टार्टर आणि पेयपानातच आम्ही ‘गार’ झालो होतो. एकूण मजा आली. हॉटेल मालकीणबाईंच्या बिझनेस स्मार्टनेसवर आम्ही खूशच झालो. आम्ही राहत होतो, तो भाग अगदी ग्रामीण आणि भलताच शांत होता. इतका, की आम्ही रस्त्यानं जाताना आमच्याच गप्पांचा आवाज सगळ्यांत मोठा यायचा. तरी खिदळतच आम्ही परत आमच्या व्हिलावर आलो. 

संध्याकाळी, इथून जवळ असलेल्या व दक्षिण गोव्यातल्या प्रमुख असलेल्या कोलवा बीचवर जायचं ठरवलं. इथं टॅक्सी वा रिक्षा मिळायची मारामार. मग गोडबोले बाईंनी त्यांच्या ओळखीचा रिक्षावाला बोलावला. सुदैवानं तो यायला तयार झाला. मग त्यानं दोन फेऱ्या मारून आम्हाला बीचवर सोडलं. पहिली तुकडी पुढं गेली असताना आपण रस्त्यानं जरा चालत जाऊ म्हणून आम्ही निम्मी जनता बाहेर पडलो. आमच्यासोबत गोडबोले बाईही त्यांच्या तीन कुत्र्यांना घेऊन बाहेर पडल्या. आम्हाला मुख्य रस्त्याला लागेपर्यंत जरा आतल्या, निर्जन रस्त्यानं जायचं होतं. तेव्हा एकदम दोन-तीन घरांतील आठ-दहा कुत्री भुंकत बाहेर आली. ‘हातात काठी ठेवा’ हा मंत्र गोडबोले बाईंनी दिलाच होता. तो आणि रामरक्षा असं दोन्ही जपत कसेबसे त्या रस्त्यातून पुढे आलो. या परिसरात एवढी शांतता होती, की आमच्यासारखी दोन-चार माणसं तिथून जाणं हीदेखील त्या कुत्र्यांसाठी ‘दिवाळी’ असणार! मग त्यांनी यथेच्छ भुंकून ती साजरी केली. पुढं केल्यावर एक जवळपास गवाच दिसणारा महाकाय रेडा दिसला. नशीब, जाड दोरानं तो बांधून ठेवला होता. अखेर आम्ही त्या मुख्य रस्त्यावर आलो आणि ‘हुश्श’ केलं. लवकरच आमचे रिक्षावाले भाऊ आले आणि त्यांनी दहा मिनिटांत आम्हाला कोलवा बीचला सोडलं. तिथपर्यंतचा रस्ता मात्र अतीव सुरेख, टिपिकल गोव्यातल्या रस्त्यासारखा देखणा होता. दोन्ही बाजूंनी गर्द झाडी, छोटासा पण अजिबात खड्डे नसलेला, पांढरे पट्टे मारलेला रस्ता, मधूनच लागणारं एखादं चर्च... असा तो सुशेगाद गोवा बघूनच मन तृप्त झालं. अर्थात कोलवा बीच आला आणि गर्दी दिसू लागली. त्या बीचवर टिपिकल बीचवर असते तसंच ‘क्राउड’ होतं. मात्र, अगदी तुफान गर्दीही नव्हती. स्वच्छ हवा होती आणि थंडगार वारं सुटलं होतं. कोलव्याला पांढरी रेती आहे. लवकरच सूर्य मावळतीकडं निघाला. हे दृश्य आपण जगाच्या पाठीवर कुठंही, कितीही वेळा टक लावून बघू शकतो, नाही का! माझीही त्या धुंद वातावरणात, त्या गर्दीतही काही क्षण समाधी लागली. धनश्रीला व मला, दोघांनाही पाण्यात खेळायला फार आवडत नाही. आम्ही तोवर आमचा सेल्फी काढून घेतला. २००३, २०१३ आणि आता २०२३! गोव्यातल्या बीचवरच्या फोटोंची अशीही हॅटट्रिक! ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असं वाटून गेलं...
बीचवरची ती संध्याकाळ फार सुंदर होती. आपलं कुटुंब, आपले जिवाभावाचे मित्र, त्यांचं कुटुंब, आमची पोरं असे आम्ही सगळे एकत्र ती मजा लुटत होतो. अशा वेळी बोलायचं नसतंच काही... आम्ही मनानं सगळे ‘इन सिंक’ होतो. सोबत होतो. हे क्षण तुमच्या जगण्यातले अमूल्य क्षण असतात. ते मावळत्या सूर्यासोबत भराभर अस्तंगत होत असतात. त्यांना मनाच्या कॅनव्हासवरच कोरून ठेवायचं असतं. बाकी जगणं वाळूसारखं हातातून निसटून गेलं, की आयुष्याच्या संध्याकाळी फक्त तो रंगलेला कॅनव्हास डोळे बंद करून बघत बसायचा असतो. ही सहल, हा खटाटोप, हे एकत्र फिरणं, एकत्र प्रवास करणं, एकत्र जेवणं, एकत्र मजा करणं हे सगळं त्यासाठीच होतं. आपण आपल्यातच असण्याचे हे खास दिवस! कोलवा बीचवरची संध्याकाळ ही अशीच कायम मन:पटलावर कोरलेली राहील...

(पूर्वार्ध)


उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
........



                                                                                                                                                     

----------------------------------------

10 Apr 2023

मुंबई ट्रिप ९-४-२३

‘जिओ’ जी भर के...
-----------------------


एखाद्या ठिकाणी नवं काही झालं, की ते (शक्य असेल तर अर्थात) तातडीने बघावं, असं मला वाटतं. मला नव्या गोष्टींविषयी सतत कुतूहल असतं. शिवाय आपल्याकडे एखादं ठिकाण नवं असताना जितकं चांगलं, आकर्षक असेल तितकं ते नंतर राहीलच असं नाही. मुंबईला सागरी सेतू बांधून तयार झाला, तेव्हा केवळ तो बघायला मी सहकुटुंब मुंबईला गेलो होतो. ही गोष्ट आहे २००९ मधली. त्यानंतर अशी बरीच ठिकाणं एक्स्प्लोअर केली. उदा. हाडशीचं विठ्ठल मंदिर. अगदी अलीकडं २०१८ मध्ये बडोद्याजवळ ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ तयार झाल्यावर लगेच मी सहकुटुंब भेट दिली होती. मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (लोकप्रिय नाव - बीकेसी) भलं मोठं जिओ कन्व्हेन्शन सेंटर उभं राहतं आहे, ही बातमी मला कळली तेव्हापासून मला त्या ठिकाणाविषयी उत्सुकता वाटत आली आहे. अगदी गेल्या महिन्यात अखेर हे केंद्र तयार झालं आणि त्याला ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ (एनएमएसीसी) असं नाव दिलंय, असं समजलं. (स्वत:चंच नाव दिलं म्हणून आधी नाक मुरडून झालं...) पण जन्मजात कुतूहलापोटी जरा ‘गुगल’ करून या केंद्राची माहिती घेतली. त्यात तिथं ‘द ग्रेट इंडियन म्युझिकल : सिव्हिलायझेशन टु नेशन’ अशा लांबलचक नावाचा एक कार्यक्रम सादर होणार आहे हे समजलं. तिथल्या ग्रँड थिएटरविषयी वाचलं होतंच. परदेशांत - न्यूयॉर्कमध्ये किंवा लंडनमध्ये - अशा ब्रॉडवे पद्धतीच्या नाटकांच्या किंवा सांगीतिक कार्यक्रमांच्या भव्य सादरीकरणाविषयी ऐकून माहिती होतं. तसा एखादा कार्यक्रम आयुष्यात एकदा तरी बघायला मिळावा, हे केव्हापासूनचं सुप्त मनातलं सुप्तच स्वप्न होतं. या कार्यक्रमाच्या जाहिरातीमुळं आणि त्यातल्या ग्रँड थिएटरच्या वर्णनामुळं हे स्वप्न अचानक पूर्ण झालं. मी १५ मार्चला सहज ‘बुक माय शो’वर या कार्यक्रमाची माहिती बघत होतो. तेव्हा बरीचशी तिकिटं विकली गेल्याचं दिसलं. मी सहज ९ एप्रिलचं तिकीट काढू या असा विचार केला आणि मला तीन तिकिटं मिळालीही! (नंतर कळलं, की हा शो २३ एप्रिलपर्यंत आहे, पण आता सगळीच तिकिटं विकली गेली आहेत.)
सर्वप्रथम हे सांगायला पाहिजे, की हे केंद्र म्हणजे एक सार्वजनिक ठिकाण आहे. ते अर्थातच सर्वांना खुलं आहे. तेथील कार्यक्रमांना आपण ‘बालगंधर्व’ किंवा ‘गणेश कला-क्रीडा मंचा’त जसं तिकिटं काढून जातो, तसं जाता येतं. त्या सेंटरच्या वेबसाइटवर किंवा ‘बुक माय शो’वर कार्यक्रम व तिकिटांची माहिती मिळते. (सेंटरच्या वेबसाइटवर आपण रजिस्ट्रेशन केलं, तर त्यांच्या आगामी कार्यक्रमांच्या सर्व मेल आपल्याला येतात.) या देखण्या, भव्य सेंटरमध्ये तीन सभागृहं आहेत. सर्वांत मोठं म्हणजे ग्रँड थिएटर. हे नावाप्रमाणेच मोठ्ठं आहे. यात दोन हजार प्रेक्षक बसू शकतील, अशी व्यवस्था आहे. अत्याधुनिक सुविधा असलेलं हे थिएटर परदेशातील कुठल्याही अशा थिएटरपेक्षा कमी नसावं. याशिवाय ‘द स्टुडिओ’ नावाचं २५० प्रेक्षकक्षमतेचं आणखी एक सभागृह आहे, तर ‘द क्युब’ नावाचं १५० प्रेक्षकक्षमतेचा समीप रंगमंच इथं आहे. (यातल्या ‘द स्टुडिओ’त शनिवारीच ‘प्रिय भाई, एक कविता हवी आहे...’ या माझ्या अतिशय लाडक्या कार्यक्रमाचा प्रयोग झाला, हे कळल्यावर आनंद वाटला.) ही सभागृहं अर्थातच (तिकीट काढलं असेल तर) सर्वांना खुली आहेत. आपण आपले स्वत:चे कार्यक्रमही तिथं करू शकतो. (किंबहुना करायला हवेत.)
आम्ही (म्हणजे धनश्री, नील व मी) रविवारी (९ एप्रिल) दुपारी एक वाजता पुण्यातून निघालो. पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर कधीही गेलात तरी कायम ट्रॅफिक असतं. त्यात अनेकदा जॅमही लागतो. त्यात अडकायचं नसेल तर जाण्या-येण्याच्या वेळा ‘ऑड’ ठेवाव्या लागतात. कुठला दिवस आहे, रविवार किंवा लाँग वीकएंड वगैरे फार अभ्यास करावा लागतो. मी नेहमीप्रमाणे तो सगळा करूनच ठेवला होता. त्यामुळं जनरली, रविवारी जेवून लोक झोपतात, त्या वेळी, म्हणजे एक वाजता आम्ही घराबाहेर पडलो. स्वाभाविकच आम्ही कुठेही अडथळा न येता पावणेपाच वाजता बीकेसीत, अगदी ‘एनएमएसीसी’त पोचलो. अर्थात फूड मॉलला एक स्टॉप झालाच. तिथं कायमच गर्दी असते. खाण्यासाठी वेटिंग असतं. मला हे असलं अजिबात आवडत नाही. पण इलाज नव्हता. मग ती महागामोलाची पोटपूजा आटोपून आम्ही एकदाचे पुढं निघालो. तो अर्धा तास वजा केला तर आम्ही बरोबर सव्वातीन तासांत पोचलो होतो. पनवेल संपल्यावर नेहमीप्रमाणे वाहनांची गर्दी सुरू झाली. तरी वाहतूक हलत होती. एका जागेवर थांबावं लागलं नाही. मुंबईत एप्रिल किंवा मेमध्ये प्रचंड उकाडा असतो. त्यामुळं आपली गाडी घेऊन जाणं इष्ट. निदान कारमधल्या एसीमुळे ‘जिवाची होतिया काहिली’चे एपिसोड टळतात. नवी मुंबईपासून पुढं एक रस्ता ठाण्याकडं जातो आणि एक डावीकडं मुंबईला. इथं वास्तविक तसे मोठे व ठळक बोर्ड हवेत. इथं थोडी गडबड होते. अर्थात शेवटी मी योग्य मार्ग धरला. वाशीच्या खाडी पुलावर नेहमीच प्रचंड गर्दी असते. इथं वाहतूक अगदी मंद चालली होती. मानखुर्दला आता मानखुर्द ते घाटकोपर नवा फ्लायओव्हर झाल्याने बीकेसीकडे जायचा वेळ बराच वाचतो. पूर्वी मला वाटतं, सायन, चुनाभट्टीकडून वांद्रे परिसराकडे जावं लागायचं. नव्या फ्लायओव्हरमुळे आम्ही लवकर पोचू असं वाटलं. पण पुढे एका ठिकाणी फ्लायओव्हरवर जाण्याऐवजी खालून पुढे आलो. मग जरा वळसा पडला. तरी आम्ही ४.४५ वाजता बीकेसीत पोचलो. मी बीकेसीचं वर्णन ऐकून होतो, मात्र प्रत्यक्षात तिथं जाण्याचा योग कधी आला नव्हता. त्या फ्लायओव्हरवरून बीकेसीची स्कायलाइन भारी दिसत होती. जणू परदेशात आलोय असंच वाटतं. उंच उंच देखण्या, काचेच्या इमारती, आखीव-रेखीव रस्ते... सगळंच लय भारी! गुगलताईंच्या मदतीनं लगेचच सेंटरपाशी पोचलो. ११ नंबरच्या गेटमधून कार पार्किंगकडे एंट्री आहे. तिथं आपल्याकडे मॉलमध्ये शिरताना होते तशीच सगळी तपासणी झाली. तळघरात चार मजले भरतील एवढं, दोन हजार कार मावतील एवढं प्रचंड पार्किंग आहे. आम्हाला पी-२ म्हणजे वरून खालच्या दिशेने दुसऱ्या मजल्यावर पार्किंग मिळालं. गाडी लावल्यावर तिथल्या पोरानं त्या पिलरचा फोटो काढून घ्या, असं सांगितलं. ते योग्यच होतं, कारण गाडी कुठं लावलीय हे परत आल्यावर तिथं शोधणं कर्मकठीण. लिफ्टमधून वर आलो, तर एका हसतमुख युवतीनं आमचं स्वागत केलं. ‘तुम्ही गल्ली चुकला आहात’ हे तिच्या चेहऱ्यावर जवळपास वाचता येत होतं. तेच तिनं गोड आंग्ल भाषेत सांगितलं. वर मधल्या वेळात तुम्ही काय काय बघू शकता, हेही सांगितलं. तिथं ‘संगम’ नावाचं एक कलाप्रदर्शन भरलं होतं. मात्र, त्याचं तिकीट खालच्या मजल्यावरून काढून आणायचं होतं. आम्ही खाली उतरलो. हा तळमजला म्हणजे या सेंटरचं मुख्य प्रवेशद्वार होतं. आम्ही पोचलो तेव्हा अगदी पाच वाजत होते, त्यामुळं तुरळक गर्दी होती. ती नंतरच्या दोन तासांत बऱ्यापैकी वाढली. आम्ही तो तळमजला बघत हिंडू लागलो. तिथं भारतीय संस्कृतीचं प्रतीक असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचे स्टॉल होते. बाजूला इन्स्टॉलेशन्स होती, भिंतीवर भव्य पेंटिंग्ज होती. एकूण सगळा प्रकार एकदम उच्च होता. सगळा परिसर सेंट्रली एसी असल्यामुळं उकाड्याचा प्रश्न मिटला होता. जागोजागी खाण्याचे स्टॉल, बसायला जागा, अत्यंत लखलखीत अशा वॉशरूम, तिथंही अपंग व्यक्तींसाठी विशेष व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर आणि बॅटरी ऑपरेटेड गाड्या... थोडक्यात, प्रगत देशांत अशा सेंटरमध्ये ज्या ज्या सुविधा असतील, त्या सर्व इथं पुरवण्यात आल्या होत्या. आम्हाला भूक लागली होती, म्हणून समोसा आणि चहा-कॉफी घेतली. दर महाग असले, तरी आपल्याकडच्या मॉल, मल्टिप्लेक्ससारखेच होते. दोन छोटे समोसे ८० रुपयांना, तर चहा व कॉफी प्रत्येकी ६० रुपयांना होती. अर्थात फूडमॉलमधले दर यांहून जास्त होते, त्यामुळं आम्हाला हे ठीकच वाटले. जागोजागी हात सॅनिटाइझ करण्याची व्यवस्था होती आणि डस्टबीनही होत्या. मग आम्हाला एकदम त्या कलाप्रदर्शनाच्या तिकिटांची आठवण झाली. त्या बॉक्स ऑफिसवर विचारलं, तर आजची तिकिटं संपल्याचं तिथल्या (हसतमुख) युवतीनं सांगितलं. थोडक्यात, ते प्रदर्शन बघायचं राहिलं. मग आम्ही खालीच टाइमपास करत बसलो. भरपूर फोटो काढले. तिथं बनारसी साड्यांचं दालन होतं. तिथं एक वृद्ध विणकर आजोबा स्वत: त्या हातमागावर साडी विणण्याचं काम करत होते. पैठणीचं दालन होतं. त्यावर मराठी नावं होती. (या सेंटरमध्ये एक गोष्ट मात्र खटकली. सगळीकडं इंग्रजी व हिंदी पाट्या होत्या. आता देवनागरी म्हणजेच मराठी असं अनेकांना वाटत असल्यानं कुणाला त्यात काही खटकत नसावं. मात्र, मला वाटलं, की व्यवस्थित मराठी पाट्याही तिथं हव्या होत्या.) बाकी एक राजस्थानी चित्रकार होता. एक ओडिशातला पट्टचित्र काढणारा कलाकार होता. एक काश्मिरी शाली विणणारे गृहस्थ होते. लोक कुतूहलानं तिथं जात होते. ती कला बघत होते. मात्र, विक्रीसाठी असलेल्या वस्तू काहीच्या काही महाग होत्या. (उदा. एका शालीची किंमत होती ८६ हजार ९०० रुपये) आम्ही अशा ठिकाणी दुरूनच नमस्कार करून पुढं जात होतो. एका ठिकाणी एक अंध व्यक्ती मेणबत्ती आणि मेणाच्या वस्तू तयार करत होती. त्या वस्तू मात्र सुंदर होत्या. अर्थात त्या खरेदी करून नंतर पडून राहतात. म्हणून आम्ही काहीच घेतलं नाही.
संध्याकाळी त्या सेंटरच्या बाहेर एक मोठं रंगीत फाउंटन सुरू करतात. त्यालाही तिकीट होतं म्हणे. चौकशी केली तर तेही अपेक्षेप्रमाणे ‘सोल्ड आउट’ होतं. वास्तविक आम्ही जिथं बसलो होतो, तिथून काचेतूनही ते दिसणारच होतं. अनेक लोक ते सुरू होण्याच्या अपेक्षेनं काचेसमोरच्या जागा पकडून बसले. आम्ही तिथंच बसलो होतो. मात्र, आमच्या ‘शो’ची वेळ साडेसात होती आणि आम्हाला सव्वासातला निघावंच लागलं. थोडक्यात, फाउंटन शो राहिला. (पुढच्या वेळेला आता कलाप्रदर्शन आणि फाउंटन...) आम्ही जिन्यानं वरच्या मजल्यावर गेलो. तिथं ड्रेस सर्कलचे प्रवेश होते. आम्हाला अजून एक मजला वर जावं लागणार होतं. मग लिफ्टनं वर गेलो. इथं आमच्या लोअर बाल्कनीचे प्रवेश सुरू होते. पाच मिनिटांतच तिथल्या रांगेतून आम्ही त्या ‘ग्रँड थिएटर’मध्ये शिरलो.
आत शिरल्या शिरल्या ते भव्य आणि देखणं सभागृह बघून एकदम ‘अहा’ असं झालं. नीट बसल्यावर लक्षात आलं, की या बाल्कनीची उंची बरीच आहे. शिवाय लोअर बाल्कनी व अप्पर बाल्कनी यातल्या रांगा सगळ्या एकापाठोपाठ एक अशाच होत्या. फक्त वरच्या काही रांगांना अप्पर बाल्कनी म्हटलं होतं आणि आम्ही बसलो होतो त्या पुढच्या रांगांना लोअर... त्यापेक्षा ड्रेस सर्कलची जागा खाली, पण रंगमंच उंचावरून दिसेल अशी नेमकी होती. पुढच्या वेळेला ड्रेस सर्कलचं तिकीट काढायचं हे ठरवून टाकलं. थिएटर भव्य होतं, दोन्ही बाजूला ते बॉक्स वगैरे होते. पण मला नंतर जरा ते थोडं छोटं वाटलं. म्हणजे याहून भव्य असू शकलं असतं असं वाटून गेलं. मुख्य रंगमंचावर एक भव्य डिजिटल पडदा होता. या पडद्याचा वापर नंतर त्या शोमध्ये महत्त्वाचा होता. ‘शो’विषयी फार काही माहिती नव्हतं. त्यामुळं पाटी कोरी होती. फिरोझ अब्बास खान यांनी हा शो दिग्दर्शित केला आहे आणि अजय-अतुल यांचं संगीत आहे, हे माहिती होतं. शोला अमिताभ बच्चन यांच्या आवाजातलं निवेदन होतं. पडद्यावर काही ओळी यायच्या. उदा. गीतेतलं वचन. मग त्यावर अमिताभ यांचं भाष्य... मग तो डिजिटल पडदा वर जायचा आणि समोर भव्य रंगमंचावर नृत्य सादर व्हायचं. सुरुवातच ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची’ या आपल्या आरतीने झाली. गणेशाची एक भव्य मूर्ती वरून खाली आली आणि एकदम दोनशे-तीनशे नृत्य कलाकार त्या भव्य मंचावर येऊन आरतीवर नृत्य करू लागले. ते दृश्य प्रेक्षणीय होतं. शेवटी अगदी ‘घालीन लोटांगण, वंदीन चरण...’ वगैरे जोरदार झालं. माझ्या डोळ्यांतून नकळत पाणी झरलं ते ऐकताना... प्रेक्षकांनीही मस्त ताल धरला होता. एकूण जोरदार सुरुवात झाली. अमिताभच्या धीरगंभीर आवाजामुळं त्या कार्यक्रमाला एक अभिजात रूप प्राप्त झालं होतं. खाली पिटात हंगेरी की ऑस्ट्रियाचा लाइव्ह ऑर्केस्ट्रा आणून बसवला होता. सभागृहाचं ॲकॉस्टिक्स उत्तम होतं. आवाज घुमत नव्हता. खणखणीत येत होता. नंतर रामायण-महाभारतापासून विविध धर्मांचं आगमन, उत्पत्ती, विचार आणि त्यावर आधारित साजेसं नृत्य किंवा गाणी असं सादर होत गेलं. प्रियांका बर्वेनं ‘कानडा राजा पंढरीचा’ अतिशय सुंदर म्हटलं. (कलाकारांत ती एकच तेवढी ओळखू आली...) एकूण कार्यक्रम चांगला रंगला. शेवटी भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत आला आणि राष्ट्रगीत होऊन ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली. मग जोरदार ‘कर्टन कॉल’ही झाला. शेवटी नीता अंबानी यांची ध्वनिमुद्रित चित्रफीत बघावी लागली. त्यात त्यांनी हे सेंटर उभे करण्यामागची त्यांची भूमिका मांडली. त्यातलं ‘हे केंद्र देशाला समर्पित केलं आहे आणि इथं केवळ महानगरांतीलच नव्हे, तर छोट्या शहरांतील, अगदी सुदूर गावांतील कलाकारांनी येऊन आपली कला सादर करावी, अशी आमची इच्छा आहे,’  हे वाक्य ठळक महत्त्वाचं. हा हेतू किती पूर्ण होतो, हे भविष्यकाळात कळेलच.
कार्यक्रम संपल्यावर वॉशरूम आणि लिफ्ट दोन्हींकडं झुंबड उडाली. मात्र, मुंबईचे लोक शिस्तीचे आहेत. पुलंनी म्हटल्याप्रमाणे, तीन इंग्रज एकत्र आले, की लाइन लावतात, तद्वत इथेही सर्वांनी शांततेत रांगा लावून आपला कार्यभाग उरकला. पार्किंगमध्ये आलो. दुपारीच दूरदृष्टीनं घेऊन ठेवलेली सँडविचेस गाडीत बसल्या बसल्या फस्त केली आणि लगेचच निघालो. (सेंटरच्या समोरच्या बाजूने फोटो काढायचा राहिला, हे नंतर लक्षात आलं. असो. पुढच्या वेळी!) गुगलताईंच्या मदतीनं पनवेलच्या मार्गाला लागलो. रविवारची रात्र असल्यानं मुंबईकडून पुण्याला या वेळी वाहतूक कमी असेल असा अंदाज होता. तसंच झालं. अजिबात ट्रॅफिक जॅम न लागता, सुरळीत आलो. फूड मॉलला पोटपूजेसाठी थांबावं लागलं, तेवढा वेळ फक्त मध्ये खर्च झाला. बाकी बरोबर एक वाजता घराच्या पार्किंगमध्ये होतो. 
दमल्यामुळं लगेच झोप लागली. मात्र, स्वप्नातही तो भव्य रंगमंच आणि तिथले रंगबिरंगी नृत्य गिरक्या घेत येत राहिले. ‘जिओ’ जी भर के म्हणत...!

---

(अधिक माहितीसाठी http://nmacc.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.) 

----

याआधीच्या मुंबई ट्रिपचा ब्लॉग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

---

22 Mar 2023

साहित्य शिवार दिवाळी अंक लेख २०२२

राष्ट्रप्रेमाचा धगधगता अंगार
--------------------------------



शहीद भगतसिंग, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांच्याविषयी आपण सगळे लहानपणापासून वाचत आलो आहोत, ऐकत आलो आहोत. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात पंजाब, महाराष्ट्र आणि बंगाल या तीन प्रांतांचा सिंहाचा वाटा होता. या तीन राज्यांतील जणू प्रतिनिधी म्हणून हे तिघे वीर ब्रिटिशांच्या सत्ताकाळात २३ मार्च १९३१ रोजी लाहोर कारागृहात फासावर गेले. या तिघांपैकी भगतसिंग हे सर्वाधिक लोकप्रिय. भगतसिंग यांचे कार्यकर्तृत्व निश्चितच मोठे. मात्र, त्या तुलनेत राजगुरू वा सुखदेव यांच्याविषयी आपल्याला फार माहिती नसते. हुतात्मा राजगुरू हे तर आपल्या मराठी मातीतले स्वातंत्र्यसैनिक. अतिशय मोठा माणूस. विशेष म्हणजे आम्हा ब्रह्मे व राजगुरू लोकांचे ते थेट पूर्वज. ही गोष्ट मला अर्थातच खूप नंतर समजली. आपल्या घराण्यात एवढा मोठा क्रांतिकारक होऊन गेला हे समजलं तेव्हा माझी छाती अभिमानानं भरून आली. आता आमचं आडनाव ब्रह्मे आणि हुतात्मा राजगुरू हे तर राजगुरू. मग आमचा आणि त्यांचा संबंध कसा आला? राजगुरूंचं मोठेपण सांगता सांगता हा वैयक्तिक नातेसंबंधही इथं सांगणं अप्रस्तुत ठरणार नाही, असं वाटतं.
हुतात्मा राजगुरू यांचं मूळ गाव चाकणजवळचं खेड. हा तरुण स्वकर्तृत्वाने काशीस संस्कृतचा पंडित बनला होता. संस्कृतमध्ये ते सहज संभाषण करीत असत. केवळ इतकंच नव्हे, तर शरीरही कमावलेलं होतं. कुस्तीत त्यांचा हात धरणारा कुणीच नव्हता. महत्त्वाचं म्हणजे ते अव्वल नेमबाज होते. असं सांगतात, की उताणे झोपून पाठीमागे असलेले लक्ष्यही ते बाणाने सहज उडवत असत. स्वातंत्र्याच्या ध्येयानं प्रेरित झालेला हा तरुण आपला देह कणखर करण्यासाठी काय काय करीत होता? रात्रीतून धावत-धावत १५-२० मैल अंतरावरील स्मशानात जायचं, तेथील विहिरीत पोहायचं आणि तशीच दौड करीत पुन्हा येऊन झोपायचं! आहे की नाही कमाल! इतका त्यांचा स्टॅमिना होता, की तासन् तास मुंग्यांच्या वारुळावर बसून दाखवत. अर्थातच मुंग्या चावा घेत. तरीही शिवरामच्या चेहऱ्यारील रेषही हलत नसे. एकदा त्यांनी एक जळती चिमणी एका हाताने दाबून फोडली. लोखंडी सांगाड्याचाही पार चुरा केला. त्यांचा हात अर्थातच खूप भाजला, काचांनी रक्तबंबाळ झाले तरीही त्यांनी हूं की चूं केले नाही.
ज्या साँडर्सच्या हत्येबद्दल भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांनाही फाशी झाली, त्या साँडर्सला मारले तेव्हाचा प्रसंग. साँडर्स आपल्या टप्प्याबाहेर आहे; त्याला गोळी लागणे शक्य नाही, अशी शंका भगतसिंगांना वाटत होती. राजगुरूंनी मात्र भगतसिंग नको नको म्हणत असतानाही तितक्याच अंतरावरून चालवलेली गोळी साँडर्सच्या दोन भुवयांच्या बरोबर मधोमध कपाळातून आरपार गेली. राजगुरूंनी लक्ष्याकडे पाहिलेदेखील नाही.
हे बघून भगतसिंग थक्क झाले. विश्वास न बसून त्यांनी नंतर त्या प्रेताला जवळून आठ गोळ्या मारल्या.
असे होते महान क्रांतिकारक राजगुरू!
आपल्याला मात्र त्यांच्याविषयी फार फार कमी माहिती होती. मी स्वत:ही याला अर्थातच अपवाद नाही. मात्र, नशिबाने पुढं मला राजगुरूंचं कार्य जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली. आपल्याच महान पूर्वजांबद्दल माझ्या मनात असलेल्या अज्ञानाचा घोर अंधार थोडा तरी दूर झाला आणि त्यांच्याविषयीच्या कृतज्ञतेचा एक नंदादीप आता माझ्या मनात कायमचा तेवत राहिला आहे.
मी राजगुरूंपर्यंत कसा पोचलो, याची पार्श्वभूमी इथं थोडीशी सांगायला हवी.
मला लहानपणापासूनच आमच्या ब्रह्मे या आडनावाविषयी कुतूहल वाटत असे. आपलं आडनाव वर्गातल्या इतर मुलांसारखं कुलकर्णी, देशपांडे, पाटील, देशमुख, पवार असं काही नसून ‘ब्रह्मे’ असं जरा (तेव्हा) अवघड वाटणारं का आहे, असा प्रश्न पडायचा. फार प्रश्न पडू न देण्याचा आणि पडले तरी न विचारण्याचा तो काळ असल्यामुळं मनातल्या या शंका आणि प्रश्न मनातच राहिले. आम्ही तेव्हा जामखेडला राहत असू. माझा जन्मही तिथलाच. त्यामुळं तेच आपलं मूळ गाव अशी माझी समजूत होती. पण कधी तरी आजोबांच्या आणि इतर चुलत आजोबा किंवा काका मंडळींच्या बोलण्यात आपलं मूळ गाव पुण्याजवळचं ‘चाकण’ आहे, असं यायचं. मी तोवर चाकण हे गाव पाहिलंही नव्हतं. चाकणच्या भुईकोट किल्ल्याचा रणसंग्राम आणि किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांचा पराक्रम याविषयी नंतर इतिहासाच्या पुस्तकांत त्रोटक वाचलं. आमचं एक कुलदैवत म्हणजे चाकणचा मुंजा. तो या चाकणच्या भुईकोट किल्ल्याच्या आतच आहे. किल्ल्याचं बांधकाम करताना ब्रह्मे घराण्यातील नऊ वर्षांच्या दामोदर नावाच्या मुलाचा बळी दिला होता आणि त्याचंच मंदिर आता तिथं आहे, अशी हकीकत घरातले जाणकार सांगायचे. त्या लहान वयातही इतक्या लहान मुलाचा बळी देण्याच्या कल्पनेनं मला प्रचंड रडू फुटलं होतं. तरीही तो किल्ला किंवा चाकणपर्यंत पोचण्याचं काही कारण दिसत नव्हतं.
मी १९९१ ला दहावीनंतर पुण्यात गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला. तिथं होस्टेलवर माझा रूम पार्टनर होता नीलेश नगरकर. त्याचं गाव होतं राजगुरुनगर. अर्थात ते पुण्याहून एका तासाच्या अंतरावर असल्यानं तो दर आठवड्याला घरी जायचा. तुलनेनं मला नगरला जाणं थोडं लांब पडायचं. त्यामुळं मी पंधरा दिवस किंवा तीन आठवड्यांनी घरी जायचो. जेव्हा मी घरी जायचो नाही, तेव्हा नीलेश मला त्याच्या घरी - खेडला - येण्याचा आग्रह करायचा. मी त्याच्याबरोबर अनेकदा त्याच्या घरी जायचो. एक दिवस राहायचो आणि दुसऱ्या दिवशी दोघेही होस्टेलला परत यायचो. तर हा माझा मित्र राजगुरुनगरला जिथं राहत होता, ते हुतात्मा राजगुरूंचं घर होतं. तो एक वाडा होता. एका बाजूला राजगुरूंचं छोटंसं स्मारक होतं आणि दुसऱ्या बाजूला काही बिऱ्हाडं राहत होती. तेव्हा राजगुरूंच्या या वास्तूनं अशा रीतीनं मला तिच्याकडं वारंवार बोलावून घेतलं होतं. अर्थात तेव्हा आम्ही तसे लहान होतो आणि आमच्या नव्या अभ्यासक्रमात स्थिर होण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळं राजगुरूंची जुजबी माहिती घेण्यापलीकडं आणि त्या वाड्यात येता-जाता त्यांच्या तसबिरीला नमस्कार करण्यापलीकडं फार काही हातून झालं नाही.
पुढं अशा काही घटना घडल्या, की मी इंजिनीअरिंग डिप्लोमा सोडून पत्रकारितेत घुसलो. नगरला ‘लोकसत्ता’त काम करत असताना तिथं विलास राजगुरू हा तरुण पेजमेकिंग आर्टिस्ट म्हणून रुजू झाला. त्याच्याशी ओळख वाढली, तेव्हा कळलं, की तो हुतात्मा राजगुरूंचा थेट वंशज आहे. मला हे ऐकून सुखद धक्काच बसला. मी विलासच्या घरी गेलो, तेव्हा कळलं, की त्याचे वडील रोज घरासमोर आपला तिरंगा लावतात आणि संध्याकाळी  (नियमाप्रमाणे) उतरवून ठेवतात. तेव्हा राष्ट्रध्वजाबाबतचे नियम बरेच कडक होते आणि कुणालाही असा घरासमोर राष्ट्रध्वज लावता यायचा नाही. मात्र, विलासच्या वडिलांनी प्रशासनाकडून खास परवानगी मिळविली होती आणि राजगुरूंचे वंशज म्हणून त्यांना तशी परवानगी मिळालीही होती. त्यांच्या घरासमोर डौलानं फडकणारा तिरंगा पाहून मला काय वाटलं, हे मी खरोखर शब्दांत सांगू शकत नाही. हुतात्मा राजगुरू भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या १६ वर्षं आधीच हुतात्मा झाले होते. त्यांना स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकताना पाहायला मिळाला नव्हता. ‘इन्किलाब झिंदाबाद’ म्हणत ते कोवळे, विशीतले तीन वीर हसत हसत फासावर गेले होते. पुढं विलासकडूनच मला राजगुरू आणि ब्रह्मे हे पूर्वीचं एकच घराणं कसं होतं, याची माहिती मिळाली. विलासनं अतिशय मेहनतीनं या सर्व इतिहासावर एक पुस्तकच लिहिलं आहे. सिद्धेश्वरशास्त्री ब्रह्मे या सिद्धपुरुषापासून आमच्या घराण्याचा इतिहास ज्ञात आहे. शहाजीराजे व छत्रपती शिवरायांकडे अनुष्ठान वा मोठा धार्मिक कार्यक्रम असल्यास ते पौरोहित्यासाठी जात असत. कचेश्वरशास्त्री हे त्यांचे चिरंजीव. त्यांना शाहू महाराजांच्या काळात ‘राजगुरू’ ही उपाधी मिळाली असं सांगतात. तेव्हापासून ब्रह्मे घराण्यातील एका शाखेचं आडनाव ‘राजगुरू’ असं झालं. 

हे कळल्यावर मला राजगुरूंविषयी वाटणारा आदर आपुलकी आणि जिव्हाळ्यात परिवर्तित झाला. त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्यावं, अशी उत्सुकता वाटू लागली. इतिहासाच्या पुस्तकांत किंवा इंटरनेटवरही त्यांच्याविषयी तशी त्रोटकच माहिती उपलब्ध आहे. मीही हा लेख लिहिताना याच माहितीचा आधार घेतला आहे.
शिवराम हरी राजगुरूंचा जन्म २४ ऑगस्ट १९०८ रोजी खेड इथं मध्यमवर्गीय कुटुंबातला. त्यांच्या वडिलांचे नाव हरी नारायण राजगुरू. त्यांनी दोन विवाह केले होते. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव पार्वतीबाई. हरी राजगुरू व पार्वतीबाई यांना एकूण पाच अपत्ये झाली. शिवराम हे त्यांचे पाचवे अपत्य. त्यांचं प्राथमिक शिक्षणही खेड इथंच झालं. शिवराम सहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचा सांभाळ त्यांचे मोठे बंधू व आईने केला. वयाच्या चौदाव्या वर्षी इंग्रजी विषयातील अपयशानंतर त्यांच्या भावाने आपल्या नववधूसमोर त्यांना इंग्रजी धडा वाचण्याची शिक्षा केली. हा अपमान सहन न झाल्याने लहानग्या शिवरामने अंगावरील वस्त्रांनिशी घर सोडलं. नंतर शिवराम राजगुरू अमरावतीला गेले. तेथील प्रसिद्ध हनुमान व्यायामशाळेच्या वातावरणात त्यांनी देशभक्तीची दीक्षा घेतली. वयाच्या १५ व्या वर्षी ते काशीला संस्कृत शिकण्यासाठी गेले. संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवतानाच न्यायशास्त्रातील मध्यमा परीक्षाही ते उत्तीर्ण झाले. ‘लघु सिद्धान्त कौमुदी’चा त्यांनी अभ्यास केला. त्यांना संस्कृत व मराठीखेरीज इंग्रजी, कन्नड, मल्याळी, हिंदी व उर्दू या भाषाही चांगल्या येत होत्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची गनिमी युद्ध पद्धती यांबद्दल त्यांना विशेष आकर्षण होतं. काही काळ राजगुरूंनी काँग्रेस सेवादलातही काढला. वाराणसीला असतानाच त्यांची सचिन्द्रनाथ संन्याल, चंद्रशेखर आझाद आदी क्रांतिकारी नेत्यांशी ओळख झाली. मग ‘हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी’मध्ये दाखल होऊन त्यांनी उत्तर भारतात क्रांतिकार्यात भाग घेतला. ‘रघुनाथ’ या टोपणनावाने ते त्या वेळी प्रसिद्ध होते. पुढे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी सुरू झाल्यावर ते या क्रांतिकारी सैन्याचे सैनिक बनले. त्यांचा बंदुकीचा नेम अचूक होता. त्यानंतर त्यांची भगतसिंग, जतिनदास, सुखदेव आदी नेत्यांशी, विशेषतः पंजाबी क्रांतिकारी नेत्यांशी मैत्री झाली.
राजगुरू २० वर्षांचे असताना भारतात ब्रिटिशांनी सायमन कमिशन पाठवले. या सायमन कमिशनच्या विरोधात झालेल्या आंदोलनात थोर नेते लाला लजपतराय जबर जखमी झाले. त्यातच १७ नोव्हेंबर १९२८ रोजी लालाजींचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा पंजाबी क्रांतिकारी नेत्यांनी निर्धार केला. यासाठी चंद्रशेखर आझाद, राजगुरू, भगतसिंग आणि जयगोपाल यांची नेमणूक करण्यात आली. चंद्रशेखर आझाद व राजगुरू हे दोघेही संयुक्त प्रांतातून आले. पंजाब आणि उत्तर प्रदेश शाखेच्या नेत्यांनी संयुक्तपणे लाहोरमध्ये ही कृती केली. या हल्ल्ल्याला जबाबदार असलेल्या स्कॉट या अधिकाऱ्याला मारायचं या क्रांतिकारकांनी ठरवलं होतं. मात्र, स्कॉटऐवजी चुकून ब्रिटिश पोलिस अधिकारी साँडर्स मारला गेला. साँडर्सवर लाहोरला १७ डिसेंबर १९२८ रोजी हल्ला झाला, तेव्हा पहिल्या दोन गोळ्या राजगुरूंनी झाडल्या. पंजाबी नेते पुढे कौन्सिल हॉलमधल्या बॉम्बबफेकीनंतर पकडले गेले; पण आझाद व राजगुरू दोन वर्षे अज्ञातस्थळी भूमिगत होते. भगतसिंग व राजगुरू दोघांनीही वेष बदलून लाहोर सोडले. भगतसिंग लाहोरवरून हावड्याला गेले, तर राजगुरू आधी लखनौला आणि तेथून वाराणसीला गेले. नंतर ते उत्तर प्रदेशातून नागपूरला आले. तेथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकाच्या घरी त्यांनी आश्रय घेतला. तेथून पुण्याला जात असताना ३० सप्टेंबर १९२९ रोजी - म्हणजे साँडर्सच्या हत्येनंतर २२ महिन्यांनी - राजगुरूंना अटक करण्यात आली. तिघांवर खटला भरण्यात आला. निकाल काय लागणार, हे स्पष्टच होतं. त्यांना भगतसिंग, सुखदेव यांच्याबरोबर लाहोरच्या कोट लखपत कारागृहात फाशी चढविण्यात आलं. मृत्यूनंतर फिरोजपूर जिल्ह्यात सतलज नदीच्या किनारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भगतसिंग या क्रांतिकारकांचे मुख्य होते, त्यामुळे त्यांचे नाव व लोकप्रियता तुलनेनं अधिक होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही भगतसिंग यांच्याविषयी अधिक बोलले गेले. ते अजिबात गैर नाहीच; परंतु राजगुरू व सुखदेव यांच्यावर मात्र काहीसा अन्याय झाला. राजगुरू यांच्या स्मरणार्थ खेड या त्यांच्या गावाचे नाव बदलून ‘राजगुरुनगर’ करण्यात आले. मात्र, त्यांच्या जन्मस्थळी अद्यापही त्यांच्या कर्तृत्वाला शोभेल असे भव्य स्मारक झालेले नाही. या भागातले लोकप्रतिनिधी दर वर्षी हुतात्मा दिनाला तशी मागणी करतात. मात्र, पुढे त्याचे काहीही होत नाही. हे भव्य स्मारक होणं आणि पुढच्या पिढीला हुतात्मा राजगुरूंविषयी अधिकाधिक माहिती होणं हीच खरी या थोर क्रांतिकारकाला आदरांजली ठरेल.


(पूर्वप्रसिद्धी : साहित्य शिवार दिवाळी अंक २०२२)

----

17 Mar 2023

रॉकेट बॉइज-२ - रिव्ह्यू

देशप्रेमाचं उत्तुंग यान
-----------------------



भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आजपर्यंत देशाची जी वैज्ञानिक प्रगती झाली आहे, तीत डॉ. होमी भाभा व डॉ. विक्रम साराभाई यांचा सिंहाचा वाटा आहे. डॉ. भाभा यांना ‘भारतीय अणुबॉम्बचे जनक’, तर डॉ. साराभाई यांना ‘भारतीय अवकाश तंत्रज्ञानाचे जनक’ असंच सार्थपणे म्हटलं जातं. आपल्याला एखाद्या राजकारण्याची किंवा प्रसिद्ध नटाची जेवढी माहिती असते, तेवढी दुर्दैवाने आपल्या शास्त्रज्ञांची नसते. शाळेत एखाद्या धड्यात एखादा परिच्छेद उल्लेख असेल तर तेवढाच. बाकी त्यांच्याविषयी कुतूहल निर्माण व्हावं, त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्यावं असं वाटण्याजोगी परिस्थिती माझ्या बालपणी तरी सभोवती नव्हती. चित्रपट माध्यम ताकदवान असलं, तरी मुख्य प्रवाहातील चित्रपटांच्या विषयांना अंगभूत मर्यादा आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांच्या आयुष्यावर चित्रपट तयार होतील, असं गेल्या दोन दशकांपूर्वी तरी नक्कीच वाटत नव्हतं. एकविसाव्या शतकानंतर परिस्थिती काहीशी बदलली असली, तरी ‘ओटीटी’चं आगमन झाल्यापासून ती विशेष पालटली आहे, असं म्हणता येईल. त्यामुळेच डॉ. भाभा व डॉ. साराभाई यांचं जीवन उलगडून दाखविणारी ‘रॉकेट बॉइज’ ही वेबसीरीज आपल्याकडे तयार होऊ शकली. ‘सोनी लिव्ह’वर गेल्या वर्षी या सीरीजचा पहिला सीझन प्रदर्शित झाला. खरं सांगायचं तर सुरुवातीचे एक-दोन भाग बघून मला ती सीरीज चक्क बोअर झाली व मी ती बघायची बंद केली. मग कुठे तरी पुन्हा या सीरीजची चर्चा कानी पडली तेव्हा मग पुन्हा बघायला घेतली आणि निग्रहानं पूर्ण केली.
सुमारे दीड वर्षानं या सीरीजचा दुसरा सीझन आला आहे. काल मी तो बघायला सुरुवात केली आणि त्यात एवढा गुंतून गेलो, की सलग आठ भाग बघूनच (बिंज वॉच) थांबलो. मी फार क्वचित सीरीज अशा ‘बिंज वॉच’ केल्या आहेत. त्यातली ही एक. साधारण ४० ते ५० मिनिटांचा एक भाग असे हे आठ भाग आपल्याला खिळवून ठेवतात, याचं कारण स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वांत महत्त्वाच्या कालखंडाचं चित्रण डॉ. भाभा व डॉ. साराभाई यांच्या जीवनकथेच्या रूपानं आपल्यासमोर येतं. यात १९६४ ते १९७४ असा दहा वर्षांचा कालखंड दाखविण्यात आला आहे. इथं एक गोष्ट सांगायला पाहिजे, की पहिला सीझन पूर्ण बघितल्याशिवाय हा सीझन बघायला सुरुवात करू नये. पहिल्या सीझनमधले अनेक संदर्भ या दुसऱ्या सीझनमध्ये येतात. पहिला सीझन जरा निग्रहानं बघायला लागतो. मात्र, डॉ. भाभा व डॉ. साराभाई यांची जडणघडण कशी झाली, याचं ते चित्रीकरण आहे. त्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते अर्थात १९६४ पर्यंतचा काळ आहे. 

दुसऱ्या सीझनमध्ये मात्र वेगवान घटनांची ‘तुफान मेल’च आहे. कॅथरिन फ्रँक यांचं ‘इंदिरा - ए लाइफ ऑफ इंदिरा नेहरू गांधी’ हे माझं आवडतं पुस्तक आहे. त्यात फ्रँक यांनी इंदिराजींच्या आयुष्यातल्या व त्यासोबतच भारताच्या इतिहासातल्या अनेक गोष्टींचं दस्तावेजीकरण करून ठेवलंय. ज्यांना त्या घटना, त्यांचा क्रम, राजकीय महत्त्व, सामाजिक महत्त्व माहिती आहे त्यांना ‘रॉकेट बॉइज’चा दुसरा सीझन बघायला मजा येईल. त्यामुळे माझी अशी शिफारस आहे, की या कालखंडातील महत्त्वाच्या घटना जाणून घेऊन मगच ही मालिका बघायला घ्यावी. सत्तरचं दशक नवभारतातलं ‘नवनिर्माणाचं दशक’ म्हणून ओळखलं जातं. स्वातंत्र्य मिळून दीड दशक झालं होतं. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांत भारतात नवनिर्माण सुरू होतं. नवी धरणं बांधली जात होती, नवे वैज्ञानिक प्रकल्प उभे राहत होते, उत्तमोत्तम कादंबऱ्या लिहिल्या जात होत्या, चांगले चित्रपट येत होते, वेगळं संगीत तयार होत होतं... याच काळात डॉ. भाभा व डॉ. साराभाई यांच्यासारखे द्रष्टे शास्त्रज्ञ ५० वर्षांनंतर भारत कुठे असेल, याची स्वप्नं बघत होते. (त्यांच्या जोडीला तेव्हा कलाम नावाचा एक भरपूर केस वाढवलेला, उत्साही तरुणही सोबत असायचा.) 
भारत १९६२ च्या चीन युद्धानंतर बॅकफूटला गेला होता. दुष्काळ, अन्नधान्याची टंचाई, भूकबळी या समस्या सार्वत्रिक होत्या. ‘रॉकेट उडवून काय करायचं? गरीब देशाला परवडणार आहे का ते?’ या आणि अशा मतांची केवळ जनतेत नव्हे, तर सरकारमध्येही चलती होती. अणुबॉम्बचं तर नावही काढायची चोरी होती. भारत हा बुद्धांचा देश होता, महात्मा गांधींचा देश होता. या देशाला अणुबॉम्ब कशाला पाहिजे? अमेरिकादी पाच नकाराधिकारप्राप्त देश अणुचाचण्या करून बसले होते आणि आता त्यांना जगात कुणीही अणुबॉम्ब बनवायला नको होता. अमेरिकेच्या ‘अरे’ला ‘का रे’ म्हणण्याची राजनैतिक हिंमत भारताच्या नेतृत्वाकडे नव्हती, याचं कारण आंतरराष्ट्रीय परिस्थिती वेगळीच होती. शीतयुद्धाचा काळ जोरात होता. शस्त्रस्पर्धा ऐन भरात होती. सीआयए, केजीबी, मोसाद यांच्या आंतरराष्ट्रीय कारवायांना ऊत आला होता. त्यांच्या कारवायांच्या दंतकथा आणि बाँडपट यांच्यात फारसा फरक उरला नव्हता. 
‘रॉकेट बॉइज’च्या दुसऱ्या सीझनला या सगळ्या आंतरराष्ट्रीय घटना-घडामोडींचा विस्तृत पट लाभला आहे. त्या भव्य पटावर ही कथा बघताना डॉ. भाभा, पं. नेहरू, डॉ. साराभाई, इंदिरा गांधी या सगळ्यांचं मोठेपण ठसल्याशिवाय राहत नाही. डॉ. भाभा व डॉ. साराभाई यांच्यातही मतभेद होतेच. डॉ. साराभाई थोडेसे मवाळ स्वभावाचे होते, तर डॉ. भाभा म्हणजे आयुष्य पूर्णपणे एंजॉय करणारे, मस्तमौला व्यक्तिमत्त्व! दोघांच्या स्वभावाचं प्रतिबिंब त्यांच्या कामगिरीतही दिसतं. या जोडीला दोघांच्या वैयक्तिक आयुष्यातले चढ-उतारही आपल्याला दिसत राहतात. विशेषत: डॉ. साराभाई आणि कमला चौधरी यांच्या नात्यामुळं मृणालिनी व साराभाई यांच्यात निर्माण झालेले मतभेद आणि पुढं त्यांचं मनोमिलन हा सगळा भाग दिग्दर्शकानं फार प्रगल्भतेनं हाताळलाय. छोट्या मल्लीचंही (मल्लिका साराभाई) दर्शन यात घडतं. 
या सर्व घटनाक्रमात नाट्य निर्माण करणारे दोन फितुर म्हणजे माथूर आणि प्रसन्नजित डे हे दोघे जण. हे या कथानाट्यातले व्हिलन आहेत. मेहदी रझा या शास्त्रज्ञाचे होमी भाभांशी असलेले मतभेद व वाद पहिल्या सीझनमध्ये आले आहेत. य वादाचे पडसाद या सीझनमध्ये भयानक पद्धतीने पडतात. नेहरूंचं निधन, लालबहादूर शास्त्री पंतप्रधानपदी येणं, त्यांचा ताश्कंदमध्ये झालेला संशयास्पद मृत्यू, इंदिरा गांधींची पंतप्रधानपदी झालेली निवड, कामराज व मोरारजी यांचं राजकारण, होमी भाभांचं नेहरूंना ‘भाई’ व इंदिराजींना ‘इंदू’ असं जवळिकीनं संबोधणं, साराभाईंच्या नियुक्तीवरून केंद्रीय मंत्रीमंडळात इंदिराजींना झालेला विरोध, सीआयएची कारस्थानं, माथूर व डे यांचे देशविरोधी उद्योग, डॉ. भाभा यांचं ‘विमान अपघाता’त झालेलं धक्कादायक निधन, इंदिराजींना बसलेला धक्का, पुढं काही विशिष्ट घटनाक्रमानंतर डॉ. साराभाईंना अणुबॉम्ब बनविण्याची जाणवलेली निकड, इंदिराजींच्या पुढाकारानं सुरू झालेला भारताचा अणुबॉम्ब तयार करण्याचा गुप्त कार्यक्रम, ‘दूरदर्शन’चे कार्यक्रम सॅटेलाइटद्वारे देशभर प्रसारित करण्याची डॉ. साराभाईंची धडपड, रॉकेटची अयशस्वी उड्डाणं, नंतर आलेलं यश, विक्रम-मृणालिनी यांचं एकत्र येणं, साराभाईंचा थुंबा येथे अचानक झालेला मृत्यू, त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी डॉ. कलाम, डॉ. राजा रामण्णा, अय्यंगार व इतर शास्त्रज्ञांनी जीवतोड मेहनत घेणं, अणुबॉम्ब निर्मितीचा कार्यक्रम अमेरिकेपासून गुप्त ठेवण्यासाठी केलेल्या नाना क्लृप्त्या-युक्त्या असा सगळा घटनाक्रम या सीझनमध्ये आपल्यासमोर धबधब्यासारखा आदळत राहतो. या सर्वांचा कळसाध्याय म्हणजे १९७४ मध्ये भारताने पोखरणमध्ये केलेली पहिली यशस्वी अणुचाचणी! ती चाचणी आणि ती पूर्ण करण्याआधी आलेल्या अडचणी हे सगळं प्रत्यक्षच बघायला हवं!
ही सगळी केवळ या दोन शास्त्रज्ञांची कहाणी न राहता, ही आपल्या देशाच्या प्रगतीच्या विलक्षण धडपडीची कहाणी झाली आहे, हे दिग्दर्शक अभय पन्नूचं सर्वांत मोठं यश आहे. म्हणूनच हा सीझन देशप्रेम, स्वाभिमान, जिद्द अशा अनेक भावनांवर स्वार होऊन, एका विलक्षण उंचीवर जाऊन पोचला आहे. अभय कोरान्ने यांनी या मालिकेचं लेखन केलं आहे. त्यांचं श्रेय महत्त्वाचं आहे. यातील सर्वच कलाकारांची कामं उत्कृष्ट झाली आहेत. डॉ. भाभांच्या भूमिकेत जिम सरभ या अभिनेत्यानं कमाल केली आहे. इश्वाकसिंह या अभिनेत्याने डॉ. साराभाई उत्तम उभे केले आहेत. मृणालिनी साराभाईंच्या भूमिकेत रेजिना कॅसँड्रा ही अभिनेत्री अप्रतिम शोभली आहे. विशेषत: तिचे नृत्य व मुद्राभिनय खास! नेहरूंच्या भूमिकेत रजित कपूर एकदम फिट! (एका प्रसंगात ते मद्यपान करताना व सिगारेट ओढताना दाखवले आहेत. नेहरू या दोन्ही गोष्टी करत होतेच; त्यामुळं त्यात काही गैर नाही. मात्र, वेबसीरीज नसती तर असे दृश्य कुणी दाखवू शकले असते काय, असे वाटून गेले!) रझाच्या भूमिकेत दिव्येंदू भट्टाचार्य या अभिनेत्याने अक्षरश: जीव ओतला आहे. शेवटी या व्यक्तिरेखेसाठी आपल्याला अतिशय वाईट वाटतं, त्याचं श्रेय या अभिनेत्याला नक्कीच आहे. अर्जुन राधाकृष्णन या तरुणाने डॉ. कलाम छान साकारले आहेत. (ही मालिका संपली असली, तरी डॉ. कलाम व त्यांचे सहकारी यांच्या कामगिरीवर पुढचा सीझन यावा असं वाटण्याइतपत या दुसऱ्या सीझनमध्ये डॉ. कलाम यांचा प्रेझेन्स आहे.) चारू शंकर यांनी साकारलेल्या इंदिराजी ठीकठाक. त्यांचा प्रोस्थेटिक मेकअप अगदी जाणवतो. सर्वांत खटकले ते यशवंतराव चव्हाण. यशवंतराव हे काळे-सावळे असले, तरी तेजस्वी व राजबिंडे व्यक्तिमत्त्व होते. या मालिकेत यशवंतरावांची व्यक्तिरेखा मात्र अजिबात नीट ठसली नाही. कामराज व मोरारजी मात्र जमले आहेत.
आपल्या देशात गेल्या ७०-७५ वर्षांत काहीच झालं नाही, वगैरे प्रचार हल्ली सुरू असतो. तो मनावर ठसविण्यापूर्वी ही मालिका नक्की बघावी. आपलं देशप्रेमाचं रॉकेट आकाशात उत्तुंग झेपावल्याशिवाय राहणार नाही!

---

दर्जा - चार स्टार

---

9 Feb 2023

वर्धा डायरी - उत्तरार्ध

‘पागल दौड’ विसरताना...
------------------------------



दुसऱ्या दिवशी अभिजित व मी लवकर उठलो. खाली जाऊन चहा घेणं गरजेचं होतं. हॉटेलच्या जवळच एक ‘आरंभ अमृततुल्य’ आणि एक ‘परमात्मा वडापाव सेंटर’ दिसलं. पुण्याबाहेर पूर्वी ‘अमृततुल्य’ दिसत नसे. सोशल मीडियाच्या या काळात सगळीकडं सांस्कृतिक सपाटीकरण झालं आहे. त्या दुकानातल्या पाट्या थेट पुणेरी होत्या. ‘परमात्मा वडापाव सेंटर’मध्ये तर्री पोहेही मिळत होते. अभिजितला भूक लागली होती. त्यामुळं एक प्लेट पोहे घेऊन ताव मारला. जरा वेळानं आवरून तिघंही पुन्हा ‘ऑटो’ करून संमेलनस्थळी पोचलो. (शंभर रुपये झाले हे आता सांगायला नको!) आज सकाळी मुख्य मंडपात डॉ. अभय बंग यांची मुलाखत होती. संपूर्ण संमेलनातलं माझ्यासाठी तरी हे एक प्रमुख आकर्षण होतं. आम्ही नाश्त्यासाठी भोजन कक्षात पोचलो, तेव्हा यशो (यशोदा वाकणकर) आणि मुक्ता (पुणतांबेकर) दोघीही तिथंच होत्या. विवेक सावंत आणि विनोद शिरसाठही होते. सावंत, शिरसाठ आणि मुक्ता हे तिघं अभय बंगांची मुलाखत घेणार होते. मुलाखतीची अधिकृत वेळ सकाळी ९.३० असली, तरी ती इथल्या शिरस्त्याप्रमाणे उशिरा सुरू होणार, हे आता जवळपास सगळ्यांनी गृहीत धरलं होतं. त्यातही तिघेही मुलाखतकर्ते आमच्यासोबतच असल्यामुळं आम्ही निवांत ब्रेकफास्ट केला. 
ब्रेकफास्टनंतर मुख्य मंडपात येऊन बसलो. मुलाखत साधारण साडेदहा वाजता सुरू झाली. शिरसाठ, मुक्ता व सावंत यांनी नेमके प्रश्न विचारले. त्यांची तयारी जाणवत होती. (नंतर आम्ही मुक्ताशी बोललो, तेव्हा तिनं या मुलाखतीसाठी किती आणि कशी तयारी केली होती, हे तपशीलवार सांगितलं.) आम्ही डॉ. बंग यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक होतो. त्यांनी अजिबात निराश केलं नाही. मी डॉ. बंग यांचं नाव प्रथम ऐकलं ते अनिल अवचट यांनी त्यांच्यावर ‘साप्ताहिक सकाळ’च्या (बहुतेक १९९४) दिवाळी अंकात लिहिलेला ‘शोध आरोग्याचा’ हा तपशीलवार लेख वाचला तेव्हा! त्यानंतर २००२ मध्ये मी व संतोष (देशपांडे) आम्ही दोघं गडचिरोलीला डॉ. बंग यांच्या ‘सर्च’ प्रकल्पात आणि पुढं हेमलकसाला डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पात दोन-दोन दिवस राहूनही आलो होतो. डॉ. बंग आणि राणी बंग यांच्याशी गप्पा मारून, त्यांच्यासोबत सकाळी फिरायला जाऊन आम्ही तेव्हा फारच खूश झालो होतो. त्यानंतर बंग यांच्याशी थेट संपर्क काही राहिला नाही. अगदी अलीकडं, म्हणजे २०१९ च्या जानेवारी लोणावळ्यात मनशक्ती केंद्रात शिक्षण परिषद भरली होती, तेव्हा वर्षाच्या (तोडमल) आग्रहास्तव मी खास लोणावळ्याला गेलो होतो, याचं एक प्रमुख कारण म्हणजे तिथं डॉ. अभय बंग येणार होते. तिथं त्यांच्याशी निवांत गप्पा झाल्या. त्यानंतर आता संमेलनात त्यांचे विचार ऐकत होतो. डॉ. बंग शांतपणे, पण ठामपणे आपले विचार मांडत होते. वर्धा परिसरातच त्यांचे वडील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ठाकूरदास बंग यांचं मोठं काम होतं. ते महात्मा गांधी आणि विनोबांच्या नित्य सहवासात होते. त्या प्रभावापासून ते गडचिरोलीत उभारलेल्या ‘सर्च’च्या कामाबद्दल, दारूमुक्तीच्या आंदोलनाबद्दल, विनोबांवर झालेल्या अन्यायाबद्दल ते तपशीलवार बोलले. ‘ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा हे तिघे मराठीतील सार्वकालिक श्रेष्ठ साहित्यिक आहेत,’ असं त्यांनी आवर्जून सांगितलं. बंग यांच्या विचारांतील ठामपणा, स्पष्टपणा त्यांच्या संयमित प्रतिपादनात सहज जाणवत होता. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीतील अनुभव, त्यांतून आलेलं शहाणपण आणि सहज-साध्या संवादातून मोठा विचार मांडण्याची हातोटी यामुळं ही मुलाखत अगदी संस्मरणीय ठरली. 
मुलाखत संपल्यावर मी व यशो थेट व्यासपीठावर गेलो डॉक्टरांना भेटायला... तिथं अर्थात त्यांच्याभोवती गर्दी होती. त्यात वर्ध्यातली स्थानिक मंडळी तर जवळपास सगळीच त्यांच्या ओळखीची! तरीही मी त्यांना भेटून मुलाखत छान झाल्याचं सांगितलं. व्यासपीठावरून खाली उतरलो तर रेणुका देशकर भेटल्या. त्या आणि मुक्ता मैत्रिणी हे समजलं. देशकर यांच्यासोबत फोटो काढले. मंदार तर त्यांच्या आवाजाचा फॅनच झाला होता. नंतर ग्रंथ प्रदर्शनात गेलो. शासकीय मुद्रणालयाच्या स्टॉलवर ‘इथं डिजिटल पेमेंट चालणार नाही; फक्त रोख’ असा बोर्ड लावलेला दिसला. मला ते जरा विचित्र वाटलं. मग त्या बोर्डचा फोटो काढला. नंतर ‘मनोविकास’च्या स्टॉलवर गेलो. तिथं आशिष पाटकर भेटले. माझं ‘सुपरहिरो’ सीरीजमधलं धोनीवरचं पुस्तक तिथं दिसलं नाही. त्याच्या प्रती संपल्याचं कळलं. नंतर शेजारीच ‘मनशक्ती’चा स्टॉल होता. तिथं दीपक अलूरकर आणि सुहास गुधाटे हे दोघं भेटले. तिथंही फोटोसेशन पार पडलं. मग संपूर्ण ग्रंथप्रदर्शनाला एक चक्कर मारली. ऊन बऱ्यापैकी जाणवत होतं. भूकही लागली होती. जेवण झाल्यावर आता आम्हाला सेवाग्रामला जायचं होतं. साधारण आठ किलोमीटर अंतरावर ‘सेवाग्राम’ आहे. तिथं जायला ‘ऑटो’वाल्यानं २०० रुपये सांगितले. आम्ही लगेच निघालो. अर्ध्या तासात तिथं पोचलो. ‘बापू कुटी’च्या समोरच त्यानं आम्हाला सोडलं. ‘सेवाग्राम’विषयी माझी जी कल्पना होती, त्यापेक्षा ही जागा, परिसर थोडा वेगळा निघाला. आत शिरल्यावर तिथल्या दाट झाडांची सावली आणि समोर दिसत असलेल्या झोपड्या यामुळं आपोआप वेगळं वातावरण जाणवू लागलं. मी यापूर्वी दिल्लीत ‘राजघाट’ला दोन-तीनदा गेलो आहे. इथं सेवाग्रामला प्रथमच येत होतो. महात्मा गांधी इथं १९३६ ते १९४६ या काळात राहिले. (तेही सलग नाहीच.) इथं आदिनिवास (सर्वांत आधी बांधलेली एक झोपडी), मग बा कुटी, मग बापू कुटी, महादेव देसाई कुटी, परचुरे शास्त्री कुटी अशा वेगवेगळ्या झोपड्या आहेत. या झोपड्या असल्या, तरी पक्क्या बांधकामाच्या आणि कौलारू आहेत. पहिली झोपडी बांधताना तिचा खर्च शंभर रुपयांपेक्षा अधिक व्हायला नको, अशी बापूजींची अट होती म्हणे. तरीही तिथं बाथटब, कमोड आदी सुविधा तेव्हाच्या काळात होत्या. यात एक टिनचा बाथटब उभा करून ठेवलेला होता, तो जास्तकरून बापूजी वापरायचे. दुसरा एक संगमरवरी बाथटब होता, ते घनश्यामदास बिर्लांनी पाठवला होता. तो लुई फिशर (गांधीजींचे चरित्रकार) वापरत असत, असं तिथं लिहिलं होतं. तिथं एक आधुनिक पद्धतीचा कमोडही होता. बापूजी तो अर्थात स्वत: स्वच्छ करत. तिथला वेळ वाया न घालवता, ते कागदपत्रं बघत. त्यासाठीची एक छोटी रॅक तिथं शेजारीच ठेवण्यात आली होती. या झोपडीची जागा कमी पडू लागली आणि तिथं इतर पुरुषांचा वावर वाढू लागला, तसं जमनालाल बजाज यांनी कस्तुरबांसाठी दुसरी झोपडी उभारण्याची इच्छा व्यक्त केली. बापूंनी नाइलाजाने ती मान्य केली. त्यानंतर स्वत: बापूजींसाठी आणखी एक कुटी उभारण्यात आली. तीत त्यांच्या दैनंदिन वापरातल्या सर्व वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. बापूजींशी संपर्क साधणं शक्य व्हावं म्हणून तत्कालीन गव्हर्नर लिनलिथगो यानं तिथं एक हॉटलाइन बसवली होती. तो फोनबूथही बापूंच्या कार्यालयात होता. याशिवाय त्या परिसरात नित्य साप आढळत. ते बंदिस्त करून ठेवण्याची मोठी पेटी आणि साप पकडण्याचा मोठा लाकडी चिमटाही तिथं होता. (आत फोटोग्राफीला परवानगी नसल्यानं या वस्तूंचे फोटो काढता आले नाहीत.) शेवटच्या काही दिवसांत आजारी असताना बापूजी (आयसोलेशनमध्ये) दुसऱ्याच एका कुटीत राहिले होते. तिच्याबाहेर ‘पागल दौड’ या शीर्षकाखाली बापूजींचे विचार लिहिलेली पाटी लावली आहे. माणूस भौतिक सुखांमागे पळतो आहे आणि खऱ्या सुखांकडे त्याचे दुर्लक्ष होते आहे, अशा आशयाचे ते विचार अगदी आजही सयुक्तिक वाटतात. 

त्या सर्व कुटींच्या आत फोटो काढायला परवानगी नसली, तरी बाहेर फोटो काढता येत होते. आम्ही तिथं फोटो काढले. व्हिडिओही केले. जरा वेळ तिथल्या डेरेदार झाडांच्या सावलीत बसलो. ही झाडं बापूजी हयात असतानाही इथं होती, या विचारानं अंगावर काटा येत होता. त्या वातावरणातल्या लहरी फार पवित्र, शांतवणाऱ्या, स्नेहशील होत्या. ‘महात्मा गांधी नामक एक महामानव या भूतलावर होऊन गेला, यावर पुढच्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत,’ असं अल्बर्ट आइन्स्टाइन गांधीजींच्या मृत्यूनंतर म्हणाले होते. सेवाग्रामच्या त्या परिसरात असताना मात्र वाटलं, त्यांचा हा सर्व इतिहास असा जतन करून ठेवला आहे, की त्या महात्म्याची आठवण तुम्हाला हरघडी व्हावी. सेवाग्राममध्ये अनेक सहली येत होत्या. मुलं चपला-बूट बाहेर काढून बापूंच्या त्या पवित्र वास्तूचं दर्शन घेत होती. अनेक कुटुंबंही मुला-बाळांना घेऊन आलेली दिसली. सर्व जण कुतूहलानं बापूंच्या सगळ्या गोष्टी बघत होते. 
आम्हाला आता तिथून निघायला हवं होतं. तास-दोन तास कसे गेले, ते कळलंही नाही. मुक्ता व यशो आम्हाला तिथंही भेटल्या. त्यांना आता पुण्याला निघायचं होतं. मग त्यांच्यासोबत चहा घेतला. त्याआधी आठवण म्हणून तिथून काही वस्तू खरेदी केल्या. मुक्ता व यशोला बाय करून आम्ही आता पवनार आश्रमाकडे निघालो.
हा आश्रमही तिथून सात-आठ किलोमीटरवर आहे. जवळच्या रस्त्यानं ‘ऑटो’वाल्यानं आम्हाला तिथं नेलं. वर्धा-नागपूर हायवे क्रॉस करून आम्ही धाम नदीच्या तीरावर असलेल्या पवनार आश्रमात पोचलो. आचार्य विनोबा भावे यांच्या दीर्घ वास्तव्यानं पुनीत झालेला हा आश्रम सेवाग्रामच्या तुलनेनं लहान होता. इथं एकच कॅम्पस होता. तिथं आम्हाला गौतम बजाज भेटले. यांच्याविषयी आम्हाला यशोनं सांगितलं होतं. ते आता जवळपास साठ वर्षं याच आश्रमात राहतात. प्रसिद्ध चित्रकार सुजाता बजाज (ज्या आता पॅरिसमध्ये असतात) त्यांची धाकटी बहीण. विनोबांच्या खूप आठवणी त्यांनी सांगितल्या. आम्ही तो आश्रम हिंडून बघितला. मला ‘गीताई’ची प्रत विकत घ्यायची होतीच. ती घेतली. ‘गीता प्रवचने’ हे पुस्तकही घेतलं. बजाज यांच्याशी आम्ही बोलत असताना पुण्यातल्याच आणखी दोन मुली तिथं आल्या. त्याही आमच्यासोबत गप्पा ऐकत थांबल्या. मग त्यांची ओळख झाली. पल्लवी पुरवंत असं त्यातल्या एकीचं नाव. आम्ही सेवाग्राममधून जो ‘ऑटो’ केला होता, तोच आता आम्हाला संमेलनस्थळी सोडणार होता. तो आमच्यासाठी तिथं थांबला होता. मग तिथून निघून अर्ध्या तासात संमेलनस्थळी आलो. भूक लागली होती. म्हणून बाहेरच्या फूड स्टॉलवर जरा चक्कर मारली. तिथं अंबाडी सरबत मिळालं. कोकम सरबतासारखंच लागत होतं. तेव्हा उन्हातून आल्यामुळं त्या सरबतानं जीव अगदी गार झाला. अनेक मंडळी भेटत होती. तिथं मुख्य मंडपात संजय आवटेची भेट झाली. आवटे, मी व मंदार आम्ही २५ वर्षांपूर्वी एकाच दिवशी ‘सकाळ’मध्ये जॉइन झालो होतो. तिघं एकत्र असे खूप दिवसांनी भेटलो. मजा आली. मुख्य मंडपात नागराज मंजुळे, किशोर कदम यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होता. त्यासाठी गर्दी व्हायला लागली होती. मग आम्हीही जागा पकडून बसलो. मुलाखत उशिराच सुरू झाली. आमचे मित्र बालाजी सुतार (आम्ही प्रेमानं त्यांना बासुदा म्हणतो...) सूत्रसंचालनाला होते. त्यात ऐन वेळी सयाजी शिंदेही व्यासपीठावर आले. मग बासुदांसह अरविंद जगताप आणि वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (यांनी मराठीतून आयएएस केले आहे) या तिघांनी नागराज, किशोर व सयाजी यांची मुलाखत एकत्रितपणे सुरू केली. या मुलाखतीसाठी काही पूर्वतयारी किंवा तिघांचे आधी काही बोलणे झाले असावे, असे अजिबात वाटत नव्हते. मुलाखत विस्कळित होत गेली. सयाजी शिंदेंचे वृक्षप्रेम प्रसिद्ध आहे. मात्र, ते दुसऱ्या कुठल्या मुद्द्यावर बोलेनातच. शेवटी नागराज व त्यांचा स्टेजवरच जरासा वाद झाला. आपलं भांडण होईल, असं नागराज त्यांना गमतीत म्हणाला. मग शेवटी ‘आईच्या आठवणी सांगा’ वगैरे विषयांवर मुलाखत आली म्हटल्यावर आम्ही तिथून उठलोच. मुलाखत कशी असावी, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे सकाळची डॉ. बंग यांची मुलाखत होती आणि मुलाखत कशी असू नये, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे ही संध्याकाळची मुलाखत होती. ‘पूर्वतयारी न करता होणारी एकमेव गोष्ट म्हणजे फजिती’ असं पु. ल. देशपांडे म्हणत असत, त्याचीच आठवण झाली.
संध्याकाळी दुसऱ्या मंडपात बासुदांच्या ‘गावकथा’चा प्रयोग होता. मला बासुदा लेखक म्हणून आवडतात. हा प्रयोग कित्येक दिवस बघायचा होता. पण नऊ वाजले तरी त्या छोट्या मंडपात अजून प्रयोगाची तयारी सुरूच होती. मी आत जाऊन बासुदांना भेटलो. त्यांच्या चेहऱ्यावर प्रयोगाचा तणाव स्पष्ट दिसत होता. मी तसं त्यांना म्हटलंही. ‘हा प्रयोग पुण्यात ‘सुदर्शन’ला सर्वाधिक रंगतो,’ असं बासुदांनी सांगितलं. प्रयोग सुरू व्हायला अजून अर्धा तास लागेल, म्हटल्यावर आम्ही जेवायला बाहेर पडलो. आवडते कवी सौमित्रही तिथंच भेटले. मग सेल्फी मस्टच! अर्ध्या तासात आम्ही जेवून आल्यावर मंदारला खरं तर त्या प्रयोगाला थांबायचा कंटाळा आला होता. जवळपास दहा वाजले होते. प्रयोग एकदाचा सुरू झाला. मात्र, थोडी सुरुवात बघितल्यावर आम्ही निघालो. (पुण्यात जेव्हा प्रयोग असेल तेव्हा आता नक्की बघणार...) रूमवर आल्यावर लगेच झोप लागली. दिवसभर दमणूक झाली होती; पण सेवाग्राममधली ती ‘पागल दौड’ शीर्षकाची पाटी सतत डोळ्यांसमोर येत राहिली...


....

रविवार. वर्ध्यातला तिसरा दिवस. सहा फेब्रुवारी. लतादीदींचं प्रथम पुण्यस्मरण. मोबाइलमध्ये ‘रंगोली’ लावली. आज दीदींची गाणी असणार, ही अपेक्षा होतीच. ‘रंगोली’नंही अपेक्षाभंग न करता चांगली गाणी लावली होती. काहीही न करता, डोळे भरून यायला लागले. शेवटी चष्मा ओला व्हायला लागला. तेव्हा तो बाजूला ठेवूनच उरलेली गाणी बघितली. मग आवरून मी व अभिजित ‘आरंभ’मध्ये चहा घेऊन आलो. आज सकाळी फार घाई नव्हती, तरी नाश्त्यासाठी संमेलनस्थळीच जावं लागणार होतं. मग तिघंही ‘ऑटो’ करून निघालो. नेहमीचाच ‘ऑटोवाला’ होता, त्यामुळं नुसतं आत जाऊन बसायचं. तो बरोबर संमेलनाच्या प्रवेशद्वारावर आणून सोडायचा. सकाळी मला ‘सकाळ’मधली एके काळची सहकारी आर्टिस्ट गौरी सावळे-संत हिचा फोन आला होता. तिच्या मुलाचा बालसाहित्य मंचावरील एका कार्यक्रमात सहभाग होता. त्यामुळे ती त्याला घेऊन आली होती.
आम्ही संमेलनस्थळी पोचल्यावर आधी नेहमीप्रमाणे नाश्ता केला. आज इथला शेवटचा दिवस होता, त्यामुळं इथला तो प्रसिद्ध गोरसपाक (दुधात केलेली कणकेची, ड्रायफ्रूट्स असलेली हँडमेड बिस्किटं) घ्यायला आम्हाला मगन संग्रहालयात जायचं होतं. मग चालतच तिकडं निघालो. तिथं गेलो तर रविवारमुळं ते संग्रहालय व गोरस भांडार बंद असल्याचं कळलं. आम्ही कपाळाला हात लावला. कुठल्याही स्थानिक माणसानं आम्हाला ही सर्वांत महत्त्वाची माहिती दिलीच नव्हती. अगदी आम्ही रस्त्यानं मगन संग्रहालयाचा पत्ता विचारत होतो, तेव्हाही लोक पत्ता सांगत होते, पण ते आज बंद असल्याचं कुणीही सांगितलं नाही. (हे मगन असं नाव का आहे, याचा खुलासा संध्याकाळी वर्धा स्टेशनवर झाला. तिथं वर्ध्याची माहिती देणारा मोठा फलक आहे. त्यात महात्मा गांधींचे चुलत भाऊ व सामाजिक कार्यकर्ते मगनलाल गांधी यांच्या नावाने हे संग्रहालय असल्याची माहिती लिहिली आहे.) संग्रहालय बंद असलं, तरी शेजारचं ‘रसोई’ हे रेस्टॉरंट सुरू होतं. इथं नक्की जेवा, असं आम्हाला अनेकांनी सांगितलं होतं. अर्थात आम्हाला संमेलनस्थळीच जेवायचं असल्याचं आम्ही तिथं जेवलो नाही, तो भाग वेगळा! मग समोर एक वर्धिनी नावाचं बचत गटांची उत्पादने विकणारं एक दालन होतं. तिथं गेलो. दारातच सासणे सर भेटले. त्यांच्या ‘सौ.’ तिथं आल्या होत्या. त्यांची मात्र भेट होऊ शकली नाही. आम्ही ‘वर्धिनी’त काही जुजबी खरेदी केली. मात्र, गोरसपाक न घेताच जावं लागणार की काय, अशी परिस्थिती उद्भवली होती. मग तिथं काम करणाऱ्या बायकांनी आम्हाला ‘इंगोले चौकात जा, तिथं अनेक दुकानांत गोरसपाक मिळेल,’ असंं सांगितलं. शेवटी एक ‘ऑटो’वाला गाठला व त्याला इंगोले चौकात जायचंय, असं सांगितलं. आम्हाला गोरसपाक हवाय म्हटल्यावर तो म्हणाला, की तुम्ही मुख्य भांडारात गेला होतात का? आता आम्हाला मुळात असं काही मुख्य आणि उप भांडार आहे हेच माहिती नव्हतं. हा ऑटोवाला पूर्वी गोरस भांडारातच काम करायचा. त्यामुळं त्याला सगळं ठाऊक होतं. त्यानं रिक्षा वळवली आणि आतल्या बाजूच्या एका रस्त्यानं त्या मुख्य भांडारापाशी नेली. तेही बंदच होतं. मात्र, तिथं समोरच त्यांचं एक आउटलेट सुरू होतं. मग तो आम्हाला तिथं घेऊन गेला. तिथं अखेर तो गोरसपाक मिळाला एकदाचा. काही मोजकीच पाकिटं शिल्लक होती. बाकी सगळा माल संपला होता. मग आम्ही एकेक पाकीट घेतलं. नंतर तिथलं दूधही प्यायचं होतं. पंधरा रुपयांना चांगला मोठा ग्लास भरून ते धारोष्ण, अमृतसम दूध समोर आलं. तिथलाच मिल्क ब्रेड घेऊन, दुधात बुडवून मग मी व अभिजितनं त्यावर चांगलाच ताव मारला. दूध प्यायल्यावर तर पोट भरल्याचीच भावना झाली. हे आउटलेट अगदी छोटंसं होतं. हे लोक हातानं हा सगळा माल तयार करतात. त्यामुळं खूप मोठ्या संख्येनं तो तयार होत नाही. तयार झालेला माल लगेच संपतो. त्यात सध्या संमेलनानिमित्त वर्ध्यात पाहुण्यांची प्रचंड गर्दी झाल्यामुळं तर तो संपणार होताच. एकूणच पुण्यातल्या प्रसिद्ध दुकानाची आठवण यावी, असंच या मंडळींचं वर्तन होतं. अर्थात क्वालिटी उत्तम होती, यात वाद नाही. मात्र, जास्त बिस्किटं तयार करावीत, संमेलनात त्याचा वेगळा स्टॉल ठेवावा, असं काही कुणाच्या मनात आलेलं दिसलं नाही. उलट संमेलनाच्या बाहेर असलेल्या स्टॉलमध्ये या मगन संग्रहालयाचाही एक स्टॉल होता. तिथं नंतर चौकशी केली तर, तिथल्या माणसानं जवळपास जीभ बाहेर काढून, कानाची पाळी पकडून, ‘आम्हाला तो (गोरसपाक) इथं विकायला अलाउड नाही,’ असं सांगितलं. ही विरक्ती भलतीच चमत्कारिक होती. असो.

आम्ही पुन्हा संमेलनस्थळी आलो आणि दारातच आम्हाला डॉ. बंग भेटले. आम्ही लगेच त्यांच्याकडे धाव घेतली. फोटो काढले. ते खरं तर गाडीत बसायला निघाले होते, पण आम्ही आमची ओळख दिल्यावर ते आमच्याशी गप्पा मारत बसले. मी पूर्वी ‘सर्च’मध्ये येऊन गेल्याचं त्यांना सांगितलं, त्यावर ‘आता पुन्हा या’ असं आमंत्रण त्यांनी तिथल्या तिथं दिलं. डॉ. राणी बंग सध्या ‘ब्रेन हॅमरेज’नं आजारी आहेत. मात्र, महिनाभरात त्या पूर्ण बऱ्या होतील, असंही डॉक्टरांनी सांगितलं. आदल्या दिवशीच्या मुलाखतीचा विषय अर्थातच निघाला. सुमित्रा भावे विनोबांवर सिनेमा करणार होत्या, तो विषयही मंदारनं काढला. अनेक विषयांवर गप्पा मारून मग डॉक्टर आमचा निरोप घेऊन तिथून गेले.
जरा वेळ मुख्य मंडपातला गांधीजी व विनोबांवरचा कार्यक्रम ऐकत, हवा खात बसलो. सत्राचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे बोलत होते. तो कार्यक्रम संपल्यानंतर गौरीला फोन केला. ती, तिचे यजमान व मुलगा शार्दूल बालसाहित्य मंचाच्या मंडपात होते. मग तिथं जाऊन त्यांची भेट घेतली. शार्दूलला शुभेच्छा दिल्या. नंतर दुपारचं जेवण घ्यायला भोजन कक्षाकडे गेलो. तिकडं जाताना ‘नागपूर मटा’ची सगळी टीम व अपराजित सर भेटले. मग पुन्हा एकदा फोटोसेशन झालं. भोजन कक्षात जेवण झाल्यावर सकाळच्या परिसंवादातले वक्ते व माझे फेसबुक फ्रेंड प्रशांत धर्माधिकारी भेटले. त्यांच्याबरोबर गप्पा झाल्या. ठाण्याच्या वृंदा टिळक व भागवत मॅडम (वृत्तनिवेदक मिलिंद भागवत यांच्या पत्नी) यांची ओळख झाली. जरा वेळानं निघालो. आता थेट हॉटेलवर जाऊन जरा पडावं व मग संध्याकाळची ट्रेन पकडायला बाहेर पडावं, यावर आमचं तिघांचंही एकमत झालं. मग संमेलनस्थळ सोडून आम्ही हॉटेलवर परतलो. आवराआवरी करण्यात जरा वेळ गेला. थोडा वेळ खरोखरच पडलो. साडेपाचला उठून पुन्हा सगळं आवरलं आणि हॉटेल सोडून बाहेर पडलो. चहा घ्यायचा होता, पण ते अमृततुल्य बंद होतं. मग रिक्षा करून स्टेशनवर गेलो. या वेळी त्या शहराचा आकार-उकार जरा लक्षात आला. स्टेशनच्या बाजूला जमनालाल बजाज यांचा पुतळा होता. पुढं तिथली मोठी मंडई लागली. त्या दिवशी तिथला बाजारही होता. भरपूर गर्दी होती. स्टेशनवर पोचल्यावर डावीकडं माघी पौर्णिमेचा भला मोठा चंद्र दिसला. त्याचे फोटो काढले. स्टेशनवर मिलिंद जोशी भेटले. तेही परत पुण्याला निघाले होते. आमच्यानंतर त्यांची ट्रेन होती. आमची ट्रेन पंधरा मिनिटं उशिरा आली. मग वर्ध्याचा निरोप घेऊन बरोबर साडेसातला आम्ही निघालो. येतानाचा प्रवास तसा नेहमीच कंटाळवाणा होतो. सुदैवानं रात्री झोप लागली. सकाळी नगरच्या पुढं ट्रेन आली तेव्हा जाग आली. दौंड कॉर्डलाइन स्टेशनला गाडी थांबली, तेव्हा खाली उतरून छान चहा घेतला. गाडी बरोबर नऊ वाजता वेळेत पुण्यात पोचली. तासाभरात घरी पोचलो. एकदम श्रम जाणवले.
वर्ध्याच्या आठवणींचा कोलाज मात्र हा थकवा घालवायला पुरेसा होता. ‘पागल दौड’ कमी करायची, हा निर्धार करण्यासाठीची शिकवण देणारा हा दौरा चांगलाच लक्षात राहील. इति लेखनसीमा!


---

(उत्तरार्ध)

---