9 Mar 2026

रूपेरी पडद्याचे मानकरी – आशा भोसले

रूपेरी पडद्याचे मानकरी – आशा भोसले
-------------------------------------------------


(पुणे आकाशवाणीवर दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांच्या जीवनावर आधारित ‘रूपेरी पडद्याचे मानकरी’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेत मी काही भाग लिहिणार आहे. त्यापैकी आशा भोसले यांच्यावर लिहिलेला भाग नुकताच प्रसारित झाला. या भागासाठी लिहिलेली संहिता...)


(नोंद - संहिता बरीच दीर्घ झाल्यामुळे कार्यक्रमात सर्वच गोष्टी समाविष्ट झाल्या नाहीत. खाली कार्यक्रमाची लिंक दिली आहे. मूळ अर्ध्या तासाचा कार्यक्रम वाढवून ४० मिनिटांचा करण्यात आला. तरीही या संहितेतील काही गोष्टी वगळाव्या लागल्या. त्यामुळे ही मूळ संहिता जरूर वाचावी.)

------

श्रोते हो, नमस्कार!

आशा भोसले… भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुरेल स्वप्न… आवाजाच्या दुनियेतील एक महान व्यक्तिमत्त्व… कमालीची वैविध्यपूर्ण गाणी गाणारी ज्येष्ठ गायिका…. अतिशय खडतर अशा संघर्षातून तावून-सुलाखून बावनकशी सोन्यासारखी लखलखणारी एक खंबीर स्त्री… स्वयंपाकाच्या आवडीपासून ते गायकांच्या नकला करण्यापर्यंत अनेकविध कलागुणा जोपासणाऱ्या आणि वयाच्या नव्वदीतही तरुणांना लाजवेल अशा उत्साहात वावरणाऱ्या जणू एखाद्या मोहक आजीबाई… आशाताईंचं नाव घेतलं, की त्यांच्या एवढ्या प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर सहज उभ्या राहतात. अर्थात या सर्व प्रतिमांना दशांगुळे पुरून उरणारी दैवी सुरांची त्यांची प्रतिभा आणि तिला कठोर मेहनतीची जोड देऊन घडलेली एक असामान्य गायिका ही प्रतिमा सर्वांत लखलखीतपणे कायमच समोर येते. भारतीय चित्रपट संगीत विश्वातली जणू ‘फर्स्ट फॅमिली’ म्हणावी, अशा मंगेशकर कुटुंबात जन्म, मात्र त्या आडनावाचं कोंदण फार लहान वयातच त्यागण्याचं प्राक्तन, त्यानंतर वाट्याला आलेला प्रचंड मोठा संघर्ष आणि अतोनात अडचणींना तोंड देत फक्त गाण्यावर लक्ष केंद्रित करणारी अफाट ताकदीची गायिका… आशा भोसले म्हणजे हे सर्वच….
भारतीय बोलपटांचा इतिहास अद्याप शंभर वर्षांचाही नाही. किंबहुना ‘आलमआरा’ हा पहिला भारतीय बोलपट प्रदर्शित झाला १९३२ मध्ये आणि पुढच्याच वर्षी आशाताईंचा जन्म झाला. याचाच अर्थ ९४ वर्षांच्या बोलपटांच्या इतिहासात आशाताईंची कारकीर्द जवळपास आठ दशकांची आहे. ही नुसती आकडेवारीच थक्क करून टाकणारी आहे. आशाताईंनी या आठ दशकांतील तब्बल ५० वर्षं तरी नक्कीच आपल्या खणखणीत आवाजानं दणाणून टाकली आहेत. केवळ हिंदीच नव्हे, तर जवळपास सर्व भारतीय भाषा, एवढेच नव्हे तर काही जागतिक भाषांतही त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांच्या गायकीएवढं वैविध्य अन्य कोणत्याही गायिकेला आतापर्यंत दाखविता आलेलं नाही. मोठ्या वृक्षाखाली दुसरी झाडं वाढत नाहीत, हा निसर्गनियम आहे. असं असलं तरी लता मंगेशकर या आपल्याच मोठ्या बहिणीच्या आकाशाहून विशाल अशा प्रतिभाप्रभावापासून जाणीवपूर्वक दूर राहून आशाताईंनी आपली स्वतंत्र कारकीर्द घडवली. एवढंच नव्हे, तर लताशी सतत तुलना होण्याचा अटळ धोका पत्करून गायलेल्या प्रत्येक गाण्यावर स्वत:ची नाममुद्रा ठसठशीतपणे उमटवली.
नावाप्रमाणेच आशा भोसले यांचं सगळं जीवन म्हणजे आशेचा, विजिगीषू जीवनेच्छेचा आणि मूर्तिमंत जिद्दीचा प्रवास आहे. त्यांचा जन्म आठ सप्टेंबर १९३३ रोजी सांगलीत झाला. वडील पं. दीनानाथ मंगेशकर यांची बलवंत नाटक कंपनी तेव्हा जोरात होती. त्या कंपनीतर्फे गावोगावी नाटकांचे खेळ होत. कंपनीत दोनशे माणसं कामाला होती. या सर्वांचे पालनपोषण पं. दीनानाथ करत असत. लता आणि मीना यांच्या पाठीवर आशाचा जन्म झाला. आशा जन्मापासूनच तब्येतीनं सुदृढ आणि खोडकर होती. कंपनीत सर्वांच्या चहापाण्यासाठी भलंमोठं दुधाचं भांडं असे. त्यावर येणारी सगळी साय लहानगी आशा गट्टम करत असे. मी या सायीवरच वाढले, म्हणून नव्वदीपार जगले, असं स्वत: आशाताईंनी एका मुलाखतीत मिश्कीलपणे सांगितलं आहे. लता आणि मीना यांना वडील गाणं शिकवत. आशा मात्र हुंदडत खेळत असे. असं असलं तरी तिचा कान तयार होता. वडील तिला लहापणी पठाण, हब्ब अशा टोपणनावांनी हाका मारत असत. लता लहानग्या आशाला कडेवर घेऊन तिचे भरपूर लाड करी. एकदा शाळेत शिक्षक आशाला कशावरून तरी ओरडले. झालं. लताला राग आला. ती आशाला कडेवर घेऊन तडक घरी निघून आली. यापुढं त्या शिक्षकाच्या शाळेत जाणार नाही, असा निश्चय तिनं बोलून दाखवला. या बहिणींचं औपचारिक शिक्षण तिथंच थांबलं. मात्र, जीवनाच्या शाळेत त्या जे काही शिकल्या, त्यातून अनेकांना भरपूर काही शिकायला मिळालं. अतिशय विपरीत परिस्थिती असताना, दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत असताना आपण केवळ गाण्यामुळं जिवंत राहिलो, असं आशाताई सांगतात तेव्हा त्यांच्या कठोर तपश्चर्येची थोडीशी कल्पना येते.
आशाताईंचा स्वभाव लहानपणापासूनच बंडखोर होता. वृत्ती स्वाभिमानी होती. वडील दीनानाथ मंगेशकर यांचं १९४२ मध्ये निधन झालं तेव्हा आशाताई केवळ नऊ वर्षांच्या होत्या. आई व लता या सर्व लहान भावंडांना घेऊन मुंबईत आल्या. तिथं चर्नीरोडला पं. नवरंग नागपूरकर यांच्याकडं महिना पाच रुपये फी देऊन आशाचं संगीत शिक्षण सुरू झालं. तिची परीक्षा घ्यायला शंकरराव व्यास हे तेव्हाचे नामवंत गायक आले होते. आशानं त्यांच्यासमोर परीक्षा म्हणून गाणं म्हणायला सुरुवात केली असताना, त्यांनी तिला थांबवलं आणि सांगितलं, की तुझा पहिला नंबर आला आहे. तुला इथं शिकायची गरज नाही. त्यानंतर त्यांच्याच ओळखीनं वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आशाला गाण्याची संधी मिळाली. तेव्हापासून स्टुडिओतला माइक आणि आशाताई यांचं अद्वैत झालं. या माइकला देव मानून त्यांनी हजारो गाणी गायली. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं जावं, एवढ्या प्रचंड संख्येनं गाणी गायली. माइक समोर असताना दुसरा कुठलाही विचार करायचा नाही; तहानभूक विसरून जायची, फक्त गाणं उत्तम होईल कसं एवढाच ध्यास घ्यायचा अशा तडफेनं आशाताईंनी आपली झळाळती कारकीर्द उभी केली. अर्थात त्या कधीही आपले ते संघर्षाचे दिवस विसरल्या नाहीत.
आशाताईंच्या कारकिर्दीचे सुरुवातीचे दिवस कष्टाचे होते. दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘माझं बाळ’ या १९४३ मध्ये आलेल्या चित्रपटात ‘चला चला नवबाला’ हे आशाताईंनी गायलेलं पहिलं चित्रपट गीत. तेव्हा त्या अवघ्या ९ वर्षांच्या होत्या. हिंदीत त्यांना पहिली संधी मिळाली ती ‘चुनरिया’ या चित्रपटात. हंसराज बहल यांच्या संगीत दिग्दर्शनात त्यांनी ‘सावन आजा’ हे पहिलं गीत गायलं. याच वर्षी त्यांची गाणी असलेला ‘अंधों की दुनिया’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. त्यांनी पहिलं सोलो हिंदी गाणं गायलं ते ‘रात की रानी’ या चित्रपटात. असं असलं तरी खूप मोठं यश आशाताईंना अद्याप मिळालं नव्हतं. त्यातच त्यांनी त्यांच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठ्या असलेल्या गणपतराव भोसले यांच्याबरोबर पळून जाऊन लग्न केलं आणि त्यांच्या आयुष्यानं एक फार खडतर वळण घेतलं. पुढची सात-आठ वर्षं त्यांच्यासाठी अतिशय कठीण होती. त्यांना तीन मुलं झाली. शिवाय उत्पन्न फार नव्हतं. या काळात अक्षरश: एक वेळ जेवून दिवस काढल्याचे अनुभव आशाताई सांगतात. गणपत भोसले तसे लवकरच निवर्तले. त्यानंतर आशाताई आणि उर्वरित मंगेशकर कुटुंब पुन्हा एकत्र आलं. अर्थात ते भविष्यात… पन्नासच्या दशकात आशाताईंचा संघर्ष सुरूच होता. त्या काळात शमशाद बेगम, जोहराबाई अंबालेवाली, अमीरबाई कर्नाटकी, गीता रॉय या गायिकांचा दबदबा होता. लता मंगेशकरांनीही ‘महल’पासून स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं होतं आणि पुढं हे साम्राज्य वाढतच जाणार होतं. त्यामुळं मुख्य नायिकेची गाणी याच गायिकांना मिळायची. या काळात आशाताईंनी पोटापाण्यासाठी मिळेल ते काम स्वीकारलं. कमी बजेटच्या, दुय्यम चित्रपटांसाठी त्या पार्श्वगायन करू लागल्या. ए. आर. कुरेशी, सज्जाद हुसैन, एस. मोहिंदर, सरदार मलिक, गुलाम महंमद या संगीतकारांनी त्यांना प्रामुख्यानं गायची संधी दिली. ‘संगदिल’ या सज्जाद हुसैन यांचं संगीत असलेल्या, १९५२ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात गाणं गायल्यामुळं आशाताईंचं थोडं नाव झालं. याच वर्षी ओ. पी. नय्यर यांनी त्यांना ‘छम छमा छम’ या चित्रपटासाठी फार मोठी संधी दिली. या चित्रपटाच्या एकूण ११ पैकी १० गाणी आशाताईंना गायला मिळाली. त्यानंतर ज्येष्ठ दिग्दर्शक बिमल रॉय यांनी १९५३ मध्ये त्यांच्या ‘परिणीता’ या चित्रपटासाठी आशाताईंना संधी दिली. राज कपूरने १९५४ मध्ये आलेल्या ‘बूट पॉलिश’ या त्याच्या चित्रपटातील गाणी आशाताईंकडून गाऊन घेतली. या चित्रपटातील गाणी गाजली. आशाताईंचं नाव होऊ लागलं. याच काळात संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्याशी आशाताईंचे सूर जुळले. १९५२ ते १९५७ या काळात नय्यर यांनी आशाताईंकडून भरपूर गाणी गाऊन घेतली. त्यातही ‘नया दौर’ या बी. आर. चोपडांच्या चित्रपटातील गाण्यांमुळं आशाताई अतिशय लोकप्रिय झाल्या. ‘माँग के साथ तुम्हारा‘ किंवा ‘साथी हाथ बढाना’, किंवा ‘उडे जब जब झुल्फें तेरी’ ही गाणी तर आजही तितकीच लोकप्रिय आहेत. मुख्य नायिकेची सर्वच्या सर्व गाणी आशाताईंनी पहिल्यांदा या चित्रपटासाठी गायली. ओ. पी. नय्यर यांचा आशाताईंच्या कारकिर्दीत आणि यशात फार मोठा वाटा आहे. यापुढेही जवळपास दहा वर्षं नय्यर-आशा जोडीनं अनेक लोकप्रिय गीतं दिली. आशाताईंच्या आवाजाची ताकद ओपींना कळली होती. त्यांनी या आवाजाच्या अफाट रेंजचा पुरेपूर वापर करून घेतला. ‘आईए मेहेरबाँ’ हे मधुबालावर चित्रित झालेलं गाणं असेल किंवा ’ये हे रेशमी जुल्फों का अंधेरा’सारखं गाणं घ्या, किंवा ‘आँखों से जो उतरी है दिल में’ घ्या, ‘आओ हुजूर तुम को’मधली ती प्रसिद्ध उचकी घ्या; ‘वो हसीन दर्द दे दो’सारखं गाणं घ्या; आशाताईंच्या आवाजाचा पुरेपूर कस लागलेला दिसतो. आशाताईंनीही ही गाणी अशी गायली आहेत, की त्यांच्यासारखी अन्य कुणी गाऊ शकेल असं वाटतही नाही. दुर्दैवानं कालांतरानं आशाताई व नय्यर यांचे मतभेद झाले आणि त्यांनी एकत्र काम करणं बंद केलं. ‘चैन से हम को कभी’ या आशाताईंनी गायलेल्या अप्रतिम गीताला नय्यर यांचंच संगीत होतं. अनेक रसिकांना ते या जोडीचं ‘स्वान साँग’ किंवा भैरवी आहे, असं वाटतं. याच दशकात नय्यर यांच्याबरोबरीने एस. डी. बर्मन आणि रवी या संगीतकारांनीही आशाताईंना भरपूर संधी दिली. त्यांच्याकडून अनेक लोकप्रिय गाणी या काळात या दोन्ही संगीतकारांनी गाऊन घेतली.

पुढं १९६६ मध्ये आलेल्या ‘तिसरी मंजिल’ या चित्रपटानं आशाताईंच्या जीवनात आणखी एक वळण आणलं. संगीतकार आर. डी. बर्मन उर्फ पंचमदा त्यांच्या आयुष्यात आले. पंचमदांसोबत आशाताईंचे सूर सर्वार्थानं जुळले. अनेक उत्तमोत्तम आणि अवघड गाणी पंचम यांनी आशाताईंकडून गाऊन घेतली. ‘तिसरी मंजिल’मधल्याच ‘ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे’ या गाण्यापासून ते ‘इजाजत’मधल्या ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’पर्यंत किती गाणी सांगावीत!
‘तिसरी मंजिल’मधलं ‘आ आ आजा’ हे गाणं ऐकलं तेव्हा आशाताईंना आपण हे गाऊच शकणार नाही, असं वाटलं होतं. त्यांनी पंचमदांना तसं सांगितलं. त्यावर पंचमदांनी आपण ही चाल बदलू या, असं त्यांना सांगितलं. मात्र, नंतर आशाताईंनी हे एक आव्हान म्हणून घेतलं. त्यांचा स्वभाव तसाच होता आणि आहे. एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही म्हणजे काय, या विचारानं त्यांनी या गाण्याचा आठ दिवस सराव केला. एकदा तर त्या त्यांच्या गाडीत सराव करत असताना त्यांचा ड्रायव्हर म्हणाला, ‘ताई, काय होतंय तुम्हाला? श्वास लागतोय बहुतेक… गाडी ‘जसलोक’ला घेऊ का?’ आशाताईंचा ‘आ आ आ आ आ जा’ ऐकून ड्रायव्हर घाबरला होता. आशाताईंनीच एका मुलाखतीत त्यांच्या मिश्कील शैलीत हा किस्सा सांगितला आहे. पुढं पंचम आणि आशा यांनी त्यांच्या गाण्यांत अचाट प्रयोग केले. विशेषत: हेलन यांचं नृत्य आणि आशाताईंचा आवाज व पंचमचं दणकेबाज संगीत ही त्रयी चांगलीच लोकप्रिय झाली. मग ते ‘कारवाँ’मधलं ‘मोनिका ओ माय डार्लिंग, पिया तू अब तू आजा’ असो किंवा ‘डॉन’मधलं ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’ असो. आशाताईंनी सगळी कॅब्रे गाणी जोरदार गायिली आणि ती तुफान लोकप्रिय ठरली. असं म्हणतात, की हेलन स्वत: आशाताईंच्या रेकॉर्डिंगला उपस्थित राहायच्या आणि त्या कसं गात आहेत, याचं निरीक्षण करायच्या. त्यानुसार त्या त्यांच्यी नृत्याची रचना करायच्या. त्यामुळंच ती सगळी गाणी चांगलीच हिट झाली. ‘कटी पतंग’ या चित्रपटातलं ‘मेरा नाम है शब्बो’ हे गाणं म्हणजे तर कमाल आहे. या गाण्यात आशाताई रूढ अर्थानं गायलेल्या नाहीत. त्या केवळ गुणगुणल्यासारख्या गद्य ओळीच म्हणतात. त्याला पंचमची ‘हा हा हा हा हा’ची जोड…. यातून त्या प्रासंगिक गाण्यानं कमाल परिणाम साधला आहे. पंचम-आशा जोडीचीही अशी अनेक गाणी कमालीची लोकप्रिय ठरली. ‘चुरा लिया है दिल को जो तुमने’, ‘दो लफ्जों की है दिल की कहानी’, ‘एक मैं और एक तू’, ‘दम मारो दम’ अशी किती गाणी सांगावीत!
आशाताईंच्या आयुष्यात एक सुवर्णपर्व आलं ते ‘उमराव जान’ या चित्रपटाच्या निमित्तानं… या वेळी संगीतकार होते खय्याम. ‘उमराव जान’ची आशाताईंनी गायलेली सर्वच्या सर्व गाणी लोकप्रिय ठरली आणि त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कारही याच चित्रपटानं मिळवून दिला. या गाण्यांसाठी खय्याम यांनी आशाताईंना अर्धा नोट खाली गायला सांगितलं होतं. आशाताईंना स्वत:लाही विश्वास नव्हता, की त्या हाफ नोट खाली गाऊ शकतील का, म्हणून. मात्र, अखेर त्यांनी खय्याम यांचं ऐकलं आणि पुढचा सगळा इतिहास आहे. मूळ उमराव जान हिचा आवाज त्या पट्टीतला होता हे खय्याम यांना माहिती होतं. त्यामुळंच त्यांनी आशाताईंच्या गायनात हा बदल केला. ‘दिल चीज क्या है’, ’ये क्या जगह है दोस्तों’, ‘इन आँखो की मस्ती’, ‘जुस्तजू जिस की की…’ या सर्वच गाण्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. या चित्रपटामुळं आशा भोसले यांचं स्थान ‘एक चांगली, मेहनती गायिका’ यापासून ‘एक सर्वश्रेष्ठ, अभिजात गायिका’ या स्थानावर जे गेलं ते कायमचं. स्वत: आशाताईंनाही जणू त्या नव्यानं सापडल्या. ‘उमराव जान’ आला तेव्हा आशाताईंचं वय ४८ होतं. त्यांच्या आवाजातील परिपक्वता सर्वोच्च पातळीवर पोचली होती. इथून पुढची दोन दशकं आशाताईंनी त्यांच्या आवाजाचे विपुल प्रयोग करून रसिकांना अक्षरश: वेड लावलं. ‘उमराव जान’नंतर पाचच वर्षांत आला तो गुलजार यांचा ‘इज़ाज़त’! या चित्रपटातील ‘मेरा कुछ सामान’ आणि ‘कतरा कतरा मिलती है’ या दोन गाण्यांनी आशा-पंचम यांची जादू आपल्याला परत एकदा अनुभवता आली. आदल्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘जीवा’ या तुलनेत दुर्लक्षित चित्रपटातही ‘रोज रोज आँखो तले’ हे अप्रतिम गाणं आशाताई-पंचम जोडीनं दिलं होतं. यात आशाताईंचे सहगायक होते किशोरकुमार यांचे पुत्र अमितकुमार.
नव्वदच्या दशकातही आशाताईंनी आपला प्रभाव कायम ठेवला. १९९५ मध्ये आलेल्या ‘रंगीला’त त्यांनी ए. आर. रेहमानच्या संगीत दिग्दर्शनात निम्म्याहून कमी वयाच्या ऊर्मिला मातोंडकरला आवाज दिला. ‘याई रे याई रे जोर लगा के नाचे रे’ या आशाताईंच्या गाण्यानं तरुणाईला थिरकायला लावलं. ‘कंबख्त इश्क है ये’, ’जरा सा झूम लू मैं’, ‘किताबें बहुत सी पढी होंगी तुमने’ अशा किती तरी लोकप्रिय गाण्यांनी तेव्हा रसिकांना वेड लावलं. एकविसावं शतक उजाडल्यावरही चिरतरुण आशाताई वयानं किती तरी लहान नायिकांना पडद्यावर खणखणीत आवाज देत होत्या. ‘लगान’मध्ये ‘राधा कैसे ना जले’ गाण्यात आशाताईंनी बहार उडवून दिली होती. अगदी अलीकडं आलेल्या ‘बेगम जान’ चित्रपटातही त्यांनी ‘प्रेम में तोहरे’ हे गाणं गाऊन रसिकांना सुखद धक्का दिला होता. सतत काळाबरोबर राहण्याची हातोटी, नवनव्या गोष्टी शिकण्याची हौस, उत्तम विनोदबुद्धी आणि गाण्याचा ध्यास ही आशाताईंच्या सदासतेज व्यक्तिमत्त्वाची सहज जाणवणारी वैशिष्ट्यं.
ओ. पी. नय्यर, खय्याम आणि आर. डी. बर्मन या संगीतकारांचं आशाताईंच्या कलाजीवनात अनन्यसाधारण स्थान असलं, तरी इतर संगीतकारांसोबतही त्यांनी भरपूर काम केलं आणि अनेक अजरामर गाणी दिली. मदनमोहन आणि लता यांची जोडी प्रसिद्ध असली, तरी ‘मेरा साया’मधलं ‘झुमका गिरा रे बरेली की बजार में’ हे अतिशय लोकप्रिय गाणं मदनमोहन यांनी आशाताईंकडून गाऊन घेतलं. ‘शोख नजर की बिजलियाँ’, ‘कभी तेरा दामन ना छोडेंगे हम’, ‘जमीं से हमें आसमाँ पर…’, ‘आप को प्यार छुपाने की बुरी आदत है’ ही या जोडीची आणखी काही प्रसिद्ध गाणी. हेमंतकुमार यांनी ‘भँवरा बडा नादान हाय’सारखं अप्रतिम गाणं आशाताईंकडून गाऊन घेतलं.
शंकर-जयकिशन यांनीही आशाताईंकडून उत्तमोत्तम गाणी गाऊन घेतली. ‘परदे में रहने दो परदा ना हटाओ’ हे ‘शिकार’मधलं गाणं आजही लोकप्रिय आहे. याच गाण्यानं आशाताईंना दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. ‘अंदाज’मधलं ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ हे किशोरसोबतचं, तर ‘रात के हमसफर’ हे ‘ॲन इव्हिनिंग इन पॅरिस’मधलं रफीसोबतचं गाणं हीही शंकर-जयकिशन जोडीचीच गाणी. ‘आवाज दे के हमें तुम बुलाओ’, ‘नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठी में क्या है’ ही अशीच आणखी काही लोकप्रिय गीतं या जोडीनं दिली. लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीकडंही आशाताईंनी विपुल गाणी म्हटली, ‘लोफर’मधलं ‘कोई शहरी बाबू’, ‘अनहोनी’मधलं ‘हंगामा हो गया’, ‘हमजोली’मधलं ‘ढल गया दिन’ अशी किती तरी गाणी सांगता येतील. कल्याणजी-आनंदजी यांच्याकडे आशाताईंनी ‘डॉन’मधलं ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’, ‘विधाता’मधलं ‘उडीबाबा’ अशी उडत्या चालीची अनेक गाणी गायली. संगीतकार रवी यांच्याकडेही आशाताईंनी अनेक गाणी गायली. ‘दो बदन’मधलं ‘जब चली ठंडी हवा’, ‘ये रातें ये मौसम’, ‘आगे भी जाने ना तू’, ‘तोरा मन दर्पण कहलाए’, ‘मुझे गले से लगा लो’ अशी किती तरी गाणी या जोडीच्या नावावर जमा आहेत. बप्पी लाहिरी आणि आशाताई या जोडीने तर ‘डिस्को युगा’त आपल्या झिंगाट गाण्यांनी एकच धमाल उडवून दिली होती. ‘हिंमतवाला’मधलं ‘ताकी ओ ताकी’, ‘नमक हलाल’मधलं ‘आज रपट जाए’, ‘जवाने जानेमन’, ‘रात बाकी’ अशी किती तरी गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती. अजित वर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनात ‘विजेता’ या चित्रपटासाठी आशाताईंनी सत्यशील देशपांडे यांच्यासह गायलेलं ‘मन आनंद आनंद छायो’ हे अप्रतिम गाणं आजही रसिकांच्या लक्षात आहे.
आशाताईंनी बहुतेक सर्व मोठ्या पुरुष सहगायकांबरोबर गाणी गायली. मात्र, त्यांची विशेष जोडी जमली ती किशोरकुमारसोबत. किशोरच्या अवलिया व्यक्तिमत्त्वाला तोडीस तोड अशा आशाताई होत्या. त्यामुळे त्यांची गाणीही तशीच खुलून यायची. ‘सीएटी कॅट, कॅट माने बिल्ली’ किंवा ‘हाल कैसा है जनाब का…’, ‘छोड दो आँचल जमाना क्या कहेगा’, ‘ये रातें ये मौसम’, ‘भली भली सी इक सुरत’, ‘एक मैं और एक तू’ अशी किती तरी अवखळ, नटखट गाणी त्यांनी अगदी धमाल पद्धतीनं गायली. किशोरच्या यॉडलिंगला किंवा रेकॉर्डिंगच्या वेळी चालणाऱ्या दंग्याला आशाताई पुरून उरायच्या. त्यामुळं दोघांची केमिस्ट्रीही चांगली जुळली होती.
किशोरप्रमाणेच महंमद रफी यांच्यासह आशाताईंनी अनेक अजरामर गाणी दिली. ‘दिवाना हुआ बादल’, ‘अभी ना जाओ छोडकर’, ‘इशारों इशारों में’, ‘अच्छा जी मैं हारी चलो’, ‘ढल गया दिन’, ‘बहुत शुक्रिया बडी मेहेरबानी’, ‘आजा पंछी अकेला है’, ‘ये परदा हटा दो’, ‘गुनगुना रहे है भंवरे’, ‘हम तेरा इंतजार करेंगे कयामत तक’…. किती गाणी सांगावीत! मुकेश यांच्याबरोबरही अगदी सुरुवातीच्या काळात ‘पतली कमर है तिरछी नजर है’, ‘छोड गये बालम’, ‘जाने न नजर पहचाने जिगर’ अशी चांगली गाणी आशाताईंनी दिली.
मन्ना डे यांच्यासह आशाताईंनी अनेक गाणी गायली. सध्या पुन्हा गाजत असलेलं ‘ना तो कारवाँ की तलाश है’ हे मन्नादा आणि आशाताईंचंच ओरिजनल गाणं. ‘श्री ४२०’मधलं ‘मुड मुड के ना देख’ हेही आशा-मन्नादा जोडीचं सुपरहिट गाणं. याशिवाय ‘तू छुपी है कहाँ’, ‘दुख भरे दिन बीते रे भय्या’, ‘ये हवा, ये नदी, ये किनारा’, ‘धीरे धीरे चलना’ अशी अनेक लोकप्रिय गाणी या जोडीनं दिली. महेंद्र कपूर यांच्यासह आशाताईंनी ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ‘अरे जा रे नटखट’, ‘आजा आजा रे तुझको मेरा प्यार पुकारे’, ‘धडकने लगी दिल की तारों की दुनिया’, ‘चलो बुलावा आया है’ अशी किती तरी चांगली गाणी दिली आहेत. ही सर्व गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत.
पुरुष सहगायकांप्रमाणेच काही गायिकांबरोबरही आशाताईंनी सहगायन केलंय. त्यात अर्थातच लतादीदींबरोबर गायलेलं ‘उत्सव’मधलं ‘मन क्यूं बहका रे बहका’, शमशाद बेगम यांच्याबरोबरचं ‘लेके पहला पहला प्यार’, उषा मंगेशकरांसह गायलेलं ‘काहे तरसाये’ ही चटकन आठवणारी काही गाणी. 

आशाताईंनी हिंदीबरोबरच मराठीतही विपुल गाणी गायिली. मराठी चित्रपटसंगीतातलं एक लखलखतं दालन आशाताईंच्या नावानं आहे. त्यांची विशेष जोडी जमली ती संगीतकार सुधीर फडके यांच्यासह. ‘जगाच्या पाठीवर’ या अतिशय लोकप्रिय ठरलेल्या १९६० मधल्या मराठी चित्रपटात बाबूजी, गदिमा आणि आशा या त्रयीनं कमाल केली. यातली सगळीच गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. ‘बाई मी विकत घेतला श्याम’, ‘नाचनाचुनी अति मी दमले’, ‘तुला पाहते रे तुला पाहते’ ही आशाताईंची गाणी आजही तितकीच आवडीनं ऐकली जातात. ‘सुवासिनी’ या चित्रपटासाठी बाबूजींनी आशाताईंकडून गाऊन घेतलेलं ‘दिवसांमागुनी दिवस चालले, ऋतूमागुनी ऋतू’ हे गाणं म्हणजे तर एक चमत्कारच आहे. या दीर्घ गाण्यात प्रत्येक अंतऱ्यात बाबूजींनी वेगवेगळ्या रागात चाल बांधली आहे. हे गाणं म्हणणं आव्हानात्मक होतं. मात्र, आशाताईंनी ते सहज पेललं. बाबूजींकडून गाण्यातले शब्द, त्यांचे नेमके उच्चार, शिस्त या सगळ्या गोष्टी आशाताईंनी आत्मसात केल्या. या जोडीनं अनेक अवीट गोडीची युगुलगीतं दिली. ‘धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना’ हे तर त्यातलं मेरुमणी म्हणावं असं जगदीश खेबूडकरांचं गाणं. ‘चंद्र आहे साक्षीला’ हेही असंच अप्रतिम गाणं. ‘मुंबईचा जावई’मधलं ‘का रे दुरावा का रे अबोला’ हेही बाबूजी-आशा जोडीचं असंच एक प्रचंड लोकप्रिय गाणं. जरा नंतरच्या काळात, म्हणजे १९८५ मध्ये आलेल्या ‘शापित’मधलं ‘दिस जातील दिस येतील’ हे सुरेश वाडकरांसह गायलेलं गाणंही खूप गाजलं. नंतर १९८७ मध्ये आलेल्या ‘पुढचं पाऊल’ या चित्रपटातलं ‘एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी’ गाणं म्हणजे बाबूजी-आशाताई यांच्या गाण्यांतलं आणखी एक मानाचं पान. या गाण्याचं ऑर्केस्ट्रेशनही जबरदस्त आहे. बाबूजींच्या गाण्यांत सहसा पाहायला न मिळणारा मोठा वाद्यवृंद, व्हायोलिन्सचा ताफा यात दिसतो. आशाताईंनीही या गाण्याचं सोनं केलंय.
बाबूजींप्रमाणेच भाऊ पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह आशाताईंनी मराठीत अनेक उत्तमोत्तम गाणी दिली. यात चित्रपटगीतांबरोबरच भावगीतांचा समावेश होता. ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे’ हे हृदयनाथ मंगेशकरांनी आशाताईंकडून गाऊन घेतलेले गाणे आशाताईंच्या गायनकौशल्याची कसोटी पाहणारे होते. यात फारशी वाद्ये नाहीत. चालही अवघड. पं. हृदयनाथांच्या चाली ऐकायला सोप्या, पण गायला अतिशय अवघड, असं आशाताई आणि लतादीदी नेहमी म्हणत. ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘मी मज हरपुन बसले गं’ ही सुरेश भटांची, ‘गेले द्यायचे राहुनी’, ‘समईच्या शुभ्र कळ्या’ ही आरती प्रभूंची, ‘चांदणे शिंपीत जाशी’ हे राजा बढेंचं आणि ‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती’ ही संत ज्ञानेश्वर माउलींची अशा वैविध्यपूर्ण रचना पंडितजींनी आपल्या मोठ्या बहिणीकडून गाऊन घेतल्या. चित्रपट संगीतात ‘जैत रे जैत’मधली गाणी कोण विसरू शकेल? ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ हे तर अगदी भरपूर लोकप्रिय झालेलं गाणं आशाताईंनी अत्यंत ठसक्यात म्हटलंय. याशिवाय ‘नभ उतरू आलं… चिंब थर्थर वल्लं’ हे गाणंही आशाताईंच्या अफाट गायकीचा प्रत्यय देणारं आहे. याच चित्रपटात ‘कोण्या राजानं राजानं’ हे गाणं आशाताईंनी त्यांची कन्या वर्षा हिच्यासह म्हटलं आहे. या दोघींना एकत्र ऐकण्याचा दुर्मीळ अनुभव हे गाणं आपल्याला देतं.
आशाताईंनी १९७० मध्ये आलेल्या ‘घरकुल’ या चित्रपटात सी. रामचंद्र यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे’ हे सुरेश भटांचं अफाट रोमँटिक गाणं गायलं आहे. हे गाणं आजही तितकंच टवटवीत आणि कमाल वाटतं. राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आशाताईंनी अनेक लावण्या गायल्या. अर्थात आशाताई आणि लावण्या या प्रवासाची सुरुवात १९५९ मध्ये आलेल्या ‘सांगत्ये ऐका’मधल्या वसंत पवार यांच्या संगीतातल्या ‘हाय, बुगडी माझी सांडली गं’पासून झाली होती. आशाताईंच्या त्या ‘हाय’वर अनेक जीव आजही फिदा आहेत. आनंदघन अर्थात लतादीदींनीही आशाताईंकडून ‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी’ ही लावणी गाऊन घेतली होती. राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनात आशाताईंनी ‘सुगंधी कट्टा’ या चित्रपटात गायलेली अनेक गाणी गाजली. ‘नाचू किती नाचू किती कंबर लचकली’, ‘तीळगूळ घ्या हो गोड गोड बोला’ ही गाणी आजही रसिकांना प्रिय आहेत. विश्वनाथ मोरे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आशाताई आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं ‘गंध फुलांचा गेला सांगून’ हे ‘भालू’मधलं सुंदर गाणं कोण विसरू शकेल?
आशाताईंच्या मराठीतल्या गाण्यांची रेंज खरोखरच थक्क करणारी आहे. पुलंनी संगीत दिलेल्या ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’ या गाण्यापासून ते ‘गोरी गोरी पान फुलांसारखी छान’ किंवा ‘तुझ्या गळ्या माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा’ ही गाणी ते ‘बाई मी पतंग उडवीत होते’ किंवा ‘कुठं कुठं जायाचं हनीमूनला’पर्यंत अनेक वैविध्यपूर्ण गाणी आशाताईंनी गायिली आहेत. पिढ्यांमागून पिढ्यांचे कान तृप्त केले आहेत. बाबूजींचे चिरंजीव श्रीधर फडके यांच्यासह केलेला ‘ऋतू हिरवा’ हा नव्वदच्या दशकात आलेला भावगीतांचा अल्बमही रसिकांनी डोक्यावर घेतला. यातलं ‘सांज ये गोकुळी’ हे गाणं पुढं ‘वजीर’ चित्रपटात घेण्यात आलं. याच अल्बममधलं ‘भोगले जे दु:ख त्याला’ ही भटांची गज़ल म्हणजे तर आशाताईंचं स्वगत म्हणावं असंच आहे. अगदी हीच भावना ‘हम दोनो’मधलं ’जहाँ में ऐसा कौन है जिस को गम मिला नहीं‘ हे आशाताईंचं गाणं ऐकताना मनात येते.
मराठीप्रमाणेच हिंदीतही आशाताईंच्या गैरफिल्मी गाण्यांचं प्रमाण आणि त्याची लोकप्रियता थक्क करणारी आहे. गुलाम अलींसोबत त्यांनी केलेला ‘मिराज-ए-गज़ल’ हा अल्बम खूप गाजला. यातलं ‘सलोना सा सजन है और मैं हूँ’ हे गाणं आजही अतिशय लोकप्रिय आहे. आशाताईंना खूप लहानपणापासून चांगल्या नकला करता यायच्या. त्यांना अगदी लहान वयात काही पाश्चात्त्य गायक आणि गायिकांची गाणी ऐकायला मिळाली. आशाताईंनी तो ढंग आपल्या गायकीत आणला. पुढं आर. डी. बर्मन यांनी तर त्यांच्या या गुणाचा खूपच उपयोग करून घेतला आणि अतिशय वेगळ्या चालीची, ढंगाची गाणी दिली. ‘अलिबाबा और चालिस चोर’मधलं ‘खतूबा खतूबा’ हे आशाताईंनी अरबी ढंगात गायलेलं गाणं याचं एक उदाहरण म्हणून सांगता येईल.
आशाताई आज ९२ वर्षांच्या आहेत. आयुष्य भरभरून जगल्या आहेत. अगदी अलीकडं ‘माई’ या चित्रपटात त्यांनी अल्झायमर असलेल्या वयस्कर स्त्रीची भूमिका केली होती. पाश्चात्त्य गायकांसोबत गाण्यांचे वेगवेगळे प्रयोग त्या करत असतात. क्रिकेटपटू ब्रेट लीबरोबर २००६ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आदी त्यांनी ‘यू आर द वन फॉर मी’ हे गाणंही गायलं होतं.
खरं तर त्यांच्या कारकिर्दीतल्या सर्व गाण्यांचा वा त्यांच्या आयुष्यातल्या सर्व घटनांचा आढावा या कार्यक्रमात घेणं अशक्यच आहे. आशाताईंना अनेक पुरस्कार मिळाले. दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मविभूषण’ही त्यांना मिळालेला आहे आणि अर्थातच चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अजोड योगदानाबद्दल त्यांना २००१ मध्ये सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. एका मुलाखतीत आशाताई म्हणाल्या होत्या, ‘मीही तुमच्यासारखीच एक सर्वसामान्य स्त्री आहे. मीही भाजी आणायला जाते, मुलांचा डबा करते. स्वयंपाक करायला मला फार आवडतं. सणवार करायला आवडतात. खरेदी करायला आवडते, साड्या विकत घ्यायला आवडतात. फक्त हा जो गळा आहे तिथं देवानं जे काही ठेवलं आहे, तेवढाच आपल्यात फरक आहे. बाकी मला तुमच्यातलीच समजा…’
आशा भोसले हे काय रसायन आहे हे यावरून कळतं. व्यक्ती म्हणून तर त्या श्रेष्ठ आहेतच; पण त्यांच्या अद्भुत, अलौकिक सूरांचं गारूड या सर्वांपलीकडं आहे. आशाताई, तुमच्या संपूर्ण जीवनाकडं पाहूनच बरंच काही शिकण्यासारखं आहे. तुमच्या अलौकिक आवाजाला, जिद्दीला, मेहनतीला, विनोदबुद्धीला आणि झुंजार वृत्तीला आमचा मानाचा मुजरा!

----

हा कार्यक्रम ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

----

रूपेरी पडद्याचे मानकरी - लता मंगेशकर हा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-----

3 Feb 2026

पुण्यभूषण दिवाळी अंक २५ - लेख

चटकदार चवीची लज्जतदार भेळ
---------------------------------------

भेळ आवडत नाही असा माणूस भेटणं कठीण. लहान-थोर, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत अशा सर्व भेदांपलीकडे जाऊन भेळ बहुतेक सर्वांना आवडतेच. करायला म्हटलं तर सोपी. तिची एकच एक अशी काही स्टँडर्ड रेसिपी नाही. त्यामुळं कुणालाही करायला सोपी वाटणारी. ती तयार करायला लागणारे सगळे घटकही मिळणं अवघड नाही. संध्याकाळचं चटक-मटक खाणं म्हणजे भेळ हे आजही अनेकांसाठी अभेद्य असं समीकरण आहे. भेळेत दोन मुख्य प्रकार. एक म्हणजे सुकी व दुसरा म्हणजे ओली. ओल्या भेळेला जरा तरी जामानिमा असतो. त्या मानाने सुकी भेळ अगदी कधीही, कुठेही तयार होऊ शकेल अशी. चुरमुरे, फरसाण, शेंगदाणे, बारीक शेव, कांदा, तळलेली वा कच्ची मिरची, असल्यास टोमॅटो व कोथिंबीर आणि वरून थोडंसं तिखट-मीठ घातलं की झाली सुकी भेळ तयार. ही शक्यतो वर्तमानपत्राच्या मोठ्या कागदावर ढीग करून खायची. शिवाय शक्यतो एकट्याने न खाता, समूहाने खायची. पूर्वी तर अनेक सार्वजनिक कार्यक्रमांनंतर कार्यकर्ते मंडळींचा हाच आहार असायचा. त्याला भत्ता असं म्हटलं जात असे. भेळभत्ता असा मूळ शब्द. नंतर त्याचं लघुरूप ‘भत्ता’ हेच प्रचलित झालं. राजकीय सभा, गणेशोत्सव, बैठका अशा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी उपस्थित सर्वांना एकत्र खायला देण्यासारखा (व अर्थात परवडणारा) हाच पदार्थ असल्यानं तो अतिशय लोकप्रिय आहे. अगदी लहान-मोठ्या सहली, गेटटुगेदर, ऑफिसमधल्या अचानक ठरणाऱ्या पार्ट्या आणि दुपारच्या वेळेला मुलांना खायला काय द्यावे या विवंचनेत असणाऱ्या आया या सर्व ठिकाणी उपयुक्त ठरते ती ही सुकी भेळ किंवा भत्ता. महाराष्ट्रातल्या विविध शहरांत-गावांत या भत्त्याची वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात. डाव्या आघाडीच्या किंवा कामगार संघटनांच्या बैठकांत अशा भत्त्यात ‘लेनिन मिक्श्चर’ हा प्रकार लोकप्रिय होता. याचं मूळ आंध्र प्रदेशात आहे. विजयवाडा येथून हे ‘लेनिन मिक्श्चर’ प्रसिद्ध झालं. भत्त्यासारखाच प्रकार, पण आंध्रात यात तळलेले दाणे, मसाले असं बंरच काय काय मिक्स करतात. सत्तरच्या दशकात मुंबईत गिरणी कामगार, त्यांच्या बैठका, कामगार संघटना, डाव्यांच्या संघटना यांतून हा प्रकार अधिक बघायला मिळे. निवडक मराठी साहित्यिकांच्या लेखनात याचा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रात नाशिक, सांगली-मिरज, पंढरपूर आदी ठिकाणचे अनुक्रमे चिवडा, भडंग व मुरमुरे राज्यभर प्रसिद्ध असल्याने तेथील भेळेत स्वाभाविकच या पदार्थांचा मुबलक वापर व्हायला लागला. किंबहुना त्या त्या शहराची ती खासियत ठरली.
ओली भेळ हा जास्त करून बागेत जाऊन खाण्याचा प्रकार. रेसिपी सुक्या भेळेसारखीच, फक्त यात चिंचेचे, पुदिन्याचे, मिरचीचे असे मिश्र पाणी घालून ती भेळ ओली केली जाते. हे घटक कसे मिळून येतात आणि ते पाणी काय चवीचं तयार होतं, यावर त्या त्या भेळेची चव ठरते. मुंबईतील चौपाटीवरची भेळ सर्व राज्यात सर्वाधिक प्रसिद्ध आहे. पु. ल. देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे, अशा ठिकाणी खाताना स्वच्छतेचे इंद्रिय आवरावे लागते. किंबहुना भे‌ळवाल्याच्या कळकटपणाच्या चढत्या श्रेणीत भेळेची चव रंगते. मुंबईत या भेळेसोबत पुरी दिली जाते. त्या पुरीनेच ती भेळ खाणे अपेक्षित असते.
मुंबईत जशी चौपाटी तशी पुण्यात सारसबाग, शनिवारवाडा आणि कमिशनर ऑफिस येथील ‘चौपाट्या’ पूर्वीपासून प्रसिद्ध होत्या. महाराष्ट्रात इतरत्र जी भेळ मिळते त्यात प्रामुख्याने फरसाण हा बेस असतो. पुणेरी भेळेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे चुरमुरे हा बेस असतो. त्यामुळ‌े पुण्याबाहेरच्या भेळी काहीशा तिखट आणि झणझणीत असतात. मात्र, पुण्यातील भेळ चवीला चटकदार असली, तरी न बाधणारी, सौम्य अशी असते. मुरमुऱ्यांसोबत पापडी, भावनगरी शेव, एक नंबर (बारीक) शेव, गाठी, खारेदाणे, तिखट बुंदी, काळे मीठ, मिरचीचा ठेचा, चिंच-खजुराची चटणी, वर कांदा-टोमॅटो हे सगळं मिश्रण मोठ्या पातेल्यात एकजीव करायचं, त्यावर पुन्हा बारीक शेव, कोथिंबीर, कांदा, ग्राहकाने मागितल्यास पुन्हा थोडी चिंचेची चटणी, सीझन असेल तर कैरीच्या फोडी अशी साधारण भेळ तयार करण्याची इथली पद्धत.
मी ३०-३५ वर्षांपूर्वी पुण्यात आलो, तेव्हा सर्वांत प्रथम सारसबागेसमोरच भेळ खाल्ली होती. त्यानंतर पुण्यातच वास्तव्य झालं. त्यानंतर अनेकदा, अनेक ठिकाणची भेळ खाल्ली. ‘सकाळ’मध्ये काम करताना शनिवारवाड्यासमोरची चौपाटी हा आमचा रात्रीच्या जेवणाऐवजीचा हक्काचा पर्याय असायचा. तेव्हा शनिवारवाड्यासमोर मोकळं मैदान होतं. आता समोर दगडी भिंत घातली आहे, ती नव्हती. तिथं रस्त्याच्या कडेलाच ओळीनं भेळेच्या, आइस्क्रीमच्या, खाऊच्या गाड्या लागलेल्या असत. जवळपास राहणारी पुणेकर मंडळी तिथं रात्री फिरायला येत. आम्हाला काम संपवून बाहेर पडायला अनेकदा उशीर होई. तोवर हॉटेलं बंद होत आलेली असत आणि खरं सांगायचं तर रोज हॉटेलमध्ये जाऊन खाणं परवडायचंही नाही. मग शनिवारवाड्यासमोरची ही चौपाटी मदतीला यायची. मी व माझे सहकारी चालत तिथं जात असू आणि तेव्हा पाच की दहा रुपयांना मिळणाऱ्या भेळेत रात्रीचं जेवण भागवत असू. तिथल्या भेळेच्या गाड्यांची नावं आता फार लक्षात नाहीत. पण एक ‘नवरत्न’ नावाची भेळ बऱ्यापैकी प्रसिद्ध होती. अर्थात तेव्हा भूक भागवणं हाच मुख्य हेतू असल्यानं भेळ किती चवीष्ट आहे की नाही वगैरे फारसं बघितलं जायचं नाही. मात्र, या सर्व भेळेच्या गाड्यांवर तेव्हाही भरभरून गर्दी व्हायची. एक पथ्य मात्र आम्ही आवर्जून पाळायचो. ते म्हणजे गणपतीच्या काळात बाहेर, रस्त्यावर ही भेळ खायची नाही! (किंवा खरं तर काहीच खायचं नाही.) त्या काळात त्या भेळेची चव पार बिघडलेली असायची. (मला वाटतं, फक्त गणपतीच्या काळात पुण्यात येऊन ही असली भेळ खाऊन मगच बाहेरचे लोक पुण्यात चांगली भेळ मिळत नाही, असं म्हणत असावेत.)
शनिवारवाड्याप्रमाणेच स्वारगेट बस स्टँडवर अगदी मध्यरात्रीही एक भेळेचा गाडा सुरू असायचा. स्थानकाच्या अगदी आत, स्वारगेट डेपोच्या बाजूला तो गाडा उभा असायचा. आम्ही कित्येकदा ऑफिस संपवून रात्री दीड-दोन वाजता तिथं जाऊन भेळ खाल्ली आहे. त्या भेळेच्या गाड्याचं नाव मात्र आता विसरलो. त्या भेळेची चव व त्यासोबत सहकाऱ्यांसोबत विविध विषयांवर झोडलेल्या मनसोक्त गप्पा मात्र आजही लक्षात आहेत. पूर्वी शिवाजीनगर रेल्वेस्थानकाजवळची झटका भेळ प्रसिद्ध होती. ही मी कधी चाखली नाही, मात्र ती खूप प्रसिद्ध होती, असं ऐकलं आहे. हे मालक म्हणे भेळ तयार करताना मानेला झटका द्यायचे म्हणून ते नाव! (हे असं नाव ठेवणं पुण्याच्या तेव्हाच्या प्रकृतीला अगदी साजेसंच...) सिटीपोस्टाजवळची अण्णांची भेळ अशीच प्रसिद्ध होती. इथं उकडलेला बटाटा घालून भेळ मिळायची. नेहमीच्या ग्राहकांशी वर गप्पांची मैफलही इथं रंगायची. अपोलो टॉकीजजवळच्या ‘इंटरव्हल’ या भेळेविषयीही फक्त ऐकलं आहे. कधी जाण्याचा योग आला नाही. तिथं प्रत्येक टेबलावर चिंचेच्या पाण्याचा तांब्या व तिखट चटणीची वाटी ठेवलेली असते म्हणे. शौकिनांनी आपल्याला हवी तशी चव तयार करून घ्यावी. लाल भडंग भेळ ही त्यांची खासियत. जंगली महाराज रस्त्यावरून झेड ब्रिजकडं वळताना आता तिथं दोन्ही बाजूंना मोठी खाऊ गल्ली विकसित झाली आहे. पूर्वी तिथं अगदी मोजक्या भेळेच्या गाड्या असायच्या. तिथली सांगली भडंग भेळ खूप प्रसिद्ध आहे. याशिवाय आर डेक्कन मॉलच्या खाली यशवंत कच्छी दाबेलीच्या शेजारी सोनाक्षी या नावाचा भेळेचा गाडा लागतो. त्यांचीही भेळ, पाणीपुरी, शेवपुरी असं सगळं चांगलं असतं.
याशिवाय तेव्हाचे आमच्या आवडीचे आणखी एक ठिकाण होते ते म्हणजे फरासखान्यासमोरचे ‘रामचंद्र भगवंत घाटगे चिवडेवाले’ यांच्याकडची कोरडी भेळ. खरं तर तो चिवडाच. मात्र, त्यात सुक्या भेळेतील सर्व घटक असायचे. अनिल अवचट यांनी या चिवडेवाल्यांवर लेख लिहिल्यामुळे ते खूपच प्रसिद्ध झाले. पायजमा, पांढरा शर्ट, गांधी टोपी अशा वेषातील ते घाटगेकाका मला आजही आठवतात. कुणी जादा लिंबू किंवा मिरची मागितली, की ते जरा वैतागायचे. ‘आम्ही करून दिलेलं मिश्रण सर्वोत्तम असून, तुम्ही ती चव बिघडवू नका,’ असंच त्यांचं सांगणं असायचं. त्यांचे नेहमीचे ग्राहक त्यामुळे कधीही जादा लिंबू, कांदा वा मिरची मागायचे नाहीत. अतिशय अप्रतिम असा हा चिवडा असायचा. इथंच अगदी जवळ जोगेश्वरीच्या बोळातील प्रवीण भेळही अतिशय जुनी व प्रसिद्ध आहे.
पूर्वी चौपाटीव्यतिरिक्त पुण्यात निव्वळ भेळेची म्हणून काही दुकानं अतिशय प्रसिद्ध होती. गुप्ता भेळ, मंडईजवळची लता भेळ, पासोड्या विठोबाजवळची नानाची भेळ, सोन्या मारुती चौकातील मारुती भेळ, लोखंडी तालमीसमोरचा (बहुतेक गजानन) भेळवाला, पुष्करिणी भेळ हे मध्य वस्तीतले असेच प्रसिद्ध भेळवाले. यांच्या पुणेरीपणाचे किस्सेही बहुतेकांना माहिती आहेत. लोखंडे तालमीचा गणपती बसतो, तिथं अगदी समोर एका अगदी चिंचोळ्या जागेत हे भेळवाले उभे राहायचे. तिरक्या भिंतीमुळे त्रिकोणी आकार तयार झाला होता तिथं. संध्याकाळी पाच वाजता तिथलं शटर वर करून ते भेळेचं दुकान सुरू करायचे. त्यांच्या भेळेची ख्याती बऱ्यापैकी होती. त्यामुळं लोक उभे राहून,  वाट बघून ती भेळ खात असत. त्या दुकानाचं नाव बहुतेक गजानन भेळ असावं. आता मला नीटसं लक्षात नाही; मात्र लक्षात आहे तो अतिशय भरभर चालणारा त्यांचा हात. अगदी थोड्या वेळात त्या भल्यामोठ्या स्टीलच्या भांड्यात ते भेळ तयार करत असत. ग्राहकांच्या गर्दीमुळे तो एकटा माणूस अनेकदा वैतागून जाई आणि लोकांवर ओरडे. मात्र, लोक तरीही तो ओरडा ऐकून घेऊनही ती भेळ खायला तिथं थांबत.

अशीच दुसरी प्रसिद्ध पुणेरी भेळ म्हणजे सदाशिव पेठेतली पुष्करिणी भेळ. कुमठेकर रोडवरील बिझीलँड बिल्डिंगमधील ही भेळ अतिशय लोकप्रिय आहे. प्रभाकर वासुदेव मेंगणे यांनी १९२५ मध्ये या भेळेची सुरुवात केली. म्हणजेच सध्या या भेळेच्या दुकानाची जन्मशताब्दी सुरू आहे. सुरुवातीला बाजीराव रोडवर ‘बँक ऑफ महाराष्ट्र’जवळ हे दुकान होतं. तिथं पूर्वी एक पुष्करिणी (हौद) असल्यामुळं दुकानाचं नावही त्यांनी ‘पुष्करिणी’ असंच ठेवलं. नंतर १९३५ मध्ये ते आताच्या जागेत गेलं व अजूनही ते तिथंच आहे. मुरमुरे, शेव, चिवडा वा फरसाण आणि चटणी हे कुठल्याही भेळ‌ेचं मूलभूत साहित्य. ‘पुष्करिणी’मध्ये हे सर्व घटक तर असतातच; शिवाय इथं लाल तिखट आणि चिंच व गुळाची चटणीही वापरली जाते. त्यामुळंच इतर भेळेपेक्षा ही भेळ अधिक चटकदार लागते. इथं एका वेळी खूप जास्त भेळ करून ठेवायची पद्धत नाही. सर्व घटकांचा कुरकुरीतपणा, ताजेपणा कायम राहावा, हाच त्यामागचा हेतू असतो. (त्यामुळं इथं वेटिंग असतं कायम!) ‘पुष्करिणी’त फरसाण, चिवडा व इतर सर्व पदार्थ स्थानिक बाजारपेठेतून व विश्वासाच्या पुरवठादारांकडूनच घेतले जातात. शेव व शेंगदाणे ताजे मिळावेत यासाठी रोज सकाळी दुकानातच शेव तळली जाते व शेंगदाणे भाजले जातात.
प्रभाकर मेंगणे यांचे नातू नित्यानंद सध्या दुकान सांभाळतात. ते आणि आणखी एक व्यवस्थापक एवढे दोघेच जण दुकानात असतात. आजूबाजूला लक्ष्मी रोड, शनिवार, मंडई, तुळशीबाग इथं खरेदी करून झाली, की बहुतेक पुणेकर इथली भेळ खायला येतातच. साधारण संध्याकाळी साडेचार वाजता दुकान उघडतं. भेळ संपेपर्यंत म्हणजे साधारण आठ-साडेआठपर्यंत ते सुरू राहतं. वेटिंग असलं, तरी सर्वांना ताजी व दर्जेदार भेळ देण्याकडं मालकांचा कटाक्ष असतो. इथल्या पाट्या हाही अनेकदा चर्चेचा विषय असतो. एकूण, अस्सल पुणेरी परंपरेतील अशी ही भेळ आहे. 

बिबवेवाडीत सुरू झालेली कल्याण भेळ म्हणजे लहान गोष्टींपासून सुरुवात करून यशाचे शिखर कसे गाठता येते याचे उत्तम उदाहरण आहे. रमेशभाऊ कोंढरे यांनी १९७४ मध्ये सुरू केलेल्या ‘कल्याण भे‌ळ’ या अन्न उद्योगाचा प्रसार आता अनेक शाखा आणि परदेशांत भेळ निर्यात करण्यापर्यंत झाला आहे. गरिबीमुळे रमेशभाऊ व त्यांचे वडील मार्केट यार्डात हमाल म्हणून काम करत असत. गरिबीमुळं चौथ्या इयत्तेतच रमेशभाऊंचं शिक्षण थांबलं. गुळाच्या ढेपा पोत्यात भरण्यापासून ते भाजी विकण्यापर्यंत सर्व व्यवसाय त्यांचं कुटुंब करत होतं. त्याच सुमारास, म्हणजे १९७४ मध्ये रमेशभाऊंच्या आईने बिबवेवाडीतील कल्याण सोसायटीच्या बाहेर शाळेतील मुलांना भेळ करून द्यायला सुरुवात केली. भेळेतील चटणी करण्याची त्यांची स्वत:ची एक खास पद्धत होती. यामुळं त्यांची भेळ मुलांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झाली. हळूहळू रमेशभाऊंनी ग्राहकांच्या प्रतिसादावरून अंदाज घेत नवनव्या डिशेस सुरू केल्या आणि या व्यवसायाचा विस्तार केला. अगदी सुरुवातीला भेळेची छोटी गाडी होती. तिथपासून आताच्या भव्य दुकानापर्यंत या भेळेच्या उद्योगाचा विस्तार कोंढरे कुटुंबीयांनी केला आहे. पुण्यात आता आठ शाखा आणि तब्बल ३८ देशांना निर्यात एवढा या व्यवसायाचा व्याप आता वाढला आहे. 

कल्याण भेळेप्रमाणेच पुण्यातील भेळेचा आणखी एक प्रसिद्ध ब्रँड म्हणजे गणेश भेळ. दिनेश गुडमेवार व त्यांचे बंधू हे या ब्रँडचे संचालक आहेत. ते मूळचे नांदेडचे. लहानपणी ते पुण्यात त्यांच्या मामाकडे येत असत. नंतर ते शाळा सोडून मामाकडेच आले व त्यांना लहान-मोठ्या कामांत मदत करू लागले. त्यांनी १९७८ मध्ये पुण्यात भेळेची एक लहान गाडी सुरू केली. त्यानंतर सुमारे २० वर्षे त्यांनी या गाडीवरूनच भेळविक्रीचा व्यवसाय केला. त्यानंतर १९९८ मध्ये कर्वेनगरमध्ये त्यांच्या वडिलांनी पहिल्यांदा गणेश भेळ या नावाने दुकान सुरू केले. त्यानंतर दोनच वर्षांत एकाची तीन दुकाने झाली. आता पुण्यात त्यांची एकूण १३ दुकाने आहेत. त्यांनी भेळेच्या व्यवसायाला कॉर्पोरेट रूप दिले. अनेक फ्रँचायझी, यंत्रांवर निर्मिती, निर्यात अशा सर्व आघाड्यांवर गणेश भेळ हा ब्रँड आता नावलौकिक टिकवून आहे. भेळेप्रमाणेच इथं चाटचे सर्व पदार्थ मिळतात आणि त्या प्रत्येक पदार्थाचं ब्रँडिंग करण्यात ‘गणेश भेळ’चे मालक यशस्वी झाले आहेत. इथल्या पदार्थांचा दर्जा आवर्जून जपला जातो. इथले कामगार अगदी पंचतारांकित हॉटेलमध्ये असतात त्याप्रमाणे केस बांधून वगैरे डिश सर्व्ह करत असतात. बहुतेक घटक पदार्थ आता कारखान्यांत यंत्रांद्वारे तयार केले जातात. पाणीपुरीसारखा पदार्थ आरोग्यदायीच असावा, यासाठी तिथं मिनरल वॉटर वापरलं जातं. हे सर्व असताना इथले पदार्थ थोडेसे महाग वाटू शकतील. मात्र, चांगल्या दर्जासाठी दाम मोजणारे ग्राहक आपल्याकडे आता विपुल आहेत. त्यांना या भेळ‌ेच्या ब्रँडचे पदार्थ निश्चितच आवडतात.
गणेश भेळेप्रमाणेच आणखी एक लोकप्रिय नाव म्हणजे कैलास भेळ. यांचं मूळ ठिकाण खरं तर पुण्यात नाही. पुण्याहून साताऱ्याला जाताना खेड शिवापूर हे गाव लागतं. इथं खूप वर्षांपासून कैलास भेळ विकली जाते. आता या महामार्गावर तुम्हाला अनेक ‘कैलास भेळ’ दिसतील. अगदी एखाद्या लहान मॉलसारखी वाटतील, एवढी भव्य भेळेची दुकानं आता तिथं तयार झाली आहेत. किसन मिठारे, कैलास मिठारे, सुभाष मिठारे व अशोक मिठारे यांनी १९७५ मध्ये शिवापूरमध्ये भेळेचं लहानसं दुकान सुरू केलं. इथल्या स्वादिष्ट, चटकदार भेळेमुळं लवकरच कैलास भेळ हे नाव पुणे-सातारा महामार्गानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांत लोकप्रिय झालं. सध्याच्या ‘कैलास भेळ’ या ब्रँडचे मालक शिवराज मिठारे यांनी हा व्यवसाय नव्या उंचीवर नेला. पुण्याबाहेरही हा ब्रँड लोकप्रिय झाला पाहिजे, या विचाराने त्यांनी व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला. आज या भेळेचे आकर्षक वेष्टन परदेशांतही निर्यात केले जाते. पुणे-सातारा महामार्गावर वरवे येथे ‘कैलास भेळ’चे मोठे विक्री केंद्र व उपाहारगृह दिसेल. आता तिथं केवळ भेळच नव्हे, तर एखाद्या उपाहारगृहात मिळतात, ते सर्व पदार्थ दिले जातात. त्यातही पिठलं-भाकरी हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. एका छोट्या दुकानापासून सुरू होऊन एका मोठ्या कंपनीपर्यंतचा हा ‘कैलास’चा पदार्थ प्रेरणादायीच आहे. मराठी माणूस व्यवसायात दिसत नाही किंवा मागे पडतो, या समजुतींना छेद देणारेच हे सर्व भेळ उद्योजक आहेत, असे म्हणता येईल.
शिवाजीनगर भागातील गुप्ता भेळ हीदेखील पुण्यातील एक प्रसिद्ध भेळ. आता सुमारे ८३ वर्षांपासून ही भेळ पुणेकरांच्या सेवेत आहे. आता गुप्तांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. सुरुवातीला अगदी छोट्या फेरीवाल्या गाड्यापासून सुरुवात झालेल्या या भेळ व्यवसायाने आता चांगलेच मूळ धरले आहे. गुप्ता भेळ येथे साधारणपणे तीन प्रकारच्या भेळ मिळतात. पहिल्या प्रकारात साधी, सुकी भेळ मिळते. यात फरसाण, मुरमुरे एवढंच असतं. दुसरी म्हणजे ओली भेळ. यात चिंचेचं पाणी, कांदा, लाल तिखट टाकून ओली भेळ तयार केली जाते. तिसरी म्हणजे मटकी भेळ. यात मटकीमुळं भेळेचा स्वाद वाढतो. गुप्ता बंधू भेळेसाठी लागणारे फरसाण स्वत: कारखान्यात तयार करतात. शेवेचे वेगवेगळे प्रकारही तयार केले जातात. छत्रपती शिवाजीमहाराज रस्त्यावर असलेलं हे दुकान सकाळी आठ वाजता सुरू होते. ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू असतं. मग पुन्हा चारनंतर सुरू होतं आणि संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू राहतं. उत्तम दर्जामुळं अगदी लांबून लांबून ही भेळ खाण्यासाठी लोक येतात, असा गुप्ता बंधूंचा अनुभव आहे.
मुंढवा (केशवनगर) येथील जय गणेश भेळ हा ब्रँडही अतिशय लोकप्रिय आहे. संजय माने यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ भेळेचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. गेल्या १८ वर्षांपासून त्यांनी हा व्यवसाय यशस्वीपणे उभारला आहे. सुरुवातीला केवळ भेळ व पाणीपुरी होती. कालानंतराने त्यांनी मटकी भेळ, रगडापुरी, दहीपुरी असे पदार्थही विक्रीसाठी ठेवले. मोठ्या ब्रँडची मोठी दुकाने आसपास होती. स्पर्धाही खूप होती. मात्र, चिकाटी, मेहनत, स्पर्धेत टिकण्यासाठी केलेला अभ्यास या सर्व गुणांमुळे माने यांचा हा ब्रँड चांगला यशस्वी झाला आहे.
पुण्यातील बहुतेक बागांजवळ भेळेची दुकाने आहेतच. छत्रपती संभाजी उद्यान हे जंगली महाराज रस्त्यावरचं आणि पुण्यातलं एक महत्त्वाचं उद्यान. या उद्यानात असलेल्या ‘पूनम भेळ’ या प्रसिद्ध दुकानाचे सध्या अमृतमहोत्सवी वर्ष सुरू आहे. खरं तर अलीकडच्या काळात संभाजी उद्यानाची रया गेल्यासारखी स्थिती आहे. जंगली महाराज रस्त्यावर आणि एकूणच पुण्यात फूड जॉइंट्स वाढल्यामुळे संभाजी उद्यानातील अनेक फूड स्टॉल एक तर कमी झाले आहेत किंवा तिथे येणाऱ्यांची संख्या तरी घटली आहे. मात्र, पूनम भेळ अद्यापही पूर्वीच्याच थाटात ग्राहकांना सेवा देत आहे. फावडे कुटुंबाच्या मालकीच्या या दुकानाची जबाबदारी आता तिसऱ्या पिढीकडे आली आहे. पुण्याचे तत्कालीन मनपा आयुक्त स. गो. बर्वे यांनी नाशिकहून बोलावून घेतल्याने फावडे कुटुंब पुण्यात आले, असे परशुराम फावडे सांगतात. फावडे यांचे आजोबा बाबूराव फावडे नाशिकमध्ये चिवडा विक्रीचा व्यवसाय करत असत. हा चिवडा अतिशय आवडल्याने बर्वे यांनी फावडे कुटुंबास पुण्यात व्यवसाय करण्यास बोलावले. तेव्हा छत्रपती संभाजी उद्यान नव्याने विकसित करण्यात आले होते. येथे फावडे कुटुंबास दुकानाचा परवाना देण्यात आला आणि एक जुलै १९५१ पासून तेथे बाबूराव फावडे यांनी चिवडाविक्री सुरू केली. त्या काळात एक आणा, दोन आणे अशी त्या चिवड्याची किंमत असायची. पुढे व्यवसायाचा व्याप वाढल्यावर परशुराम यांचे वडील मधुकर यांनी ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन्स’मधली नोकरी सोडून, या व्यवसायात उडी घेतली. त्यांनी चिवडाविक्रीसोबतच भेळ व पाणीपुरी यांचीही विक्री सुरू केली. आता परशुराम व त्यांचे बंधू वासुदेव हा व्यवसाय सांभाळतात. संभाजी उद्यानाची वेळ मर्यादित केल्याने, तसेच तेथील आकर्षणे घटल्याने व्यवसायावर परिणाम झाल्याची खंत परशुराम फावडे बोलून दाखवतात. त्यांचा स्वभाव गप्पीष्ट, बोलका. बोलता बोलता सढळ हाताने दोन पाणीपुरी प्लेटमध्ये अधिक घालतील. पाणीपुरीतही उगाचच खारी बुंदी, शेव वगैरे जादा गोष्टी टाकण्यावर त्यांचा विश्वास नाही. फक्त पाणीपुरीचं ते खास तयार केलेलं पाणी घालूनच पुरी खायला पाहिजे असा त्यांचा कटाक्ष. तशीच पाणीपुरी आवडते म्हटल्यावर खुलून दोन पुऱ्या प्लेटमध्ये अधिक टाकतात. वर थोडी भेळ ऑफिसमध्ये खायला बांधून देऊ का, असंही म्हणतात. याचे कुठलेही जादा पैसे वगैरे नाहीत. वर्षानुवर्षे बांधून ठेवलेले ग्राहक का बांधून राहतात, याचं गुपित फावडे यांच्याकडं बघितलं की सहज उलगडतं.
पुण्यातल्या सर्व भेळ दुकानांचं आद्यपीठ म्हणता येईल अशी जागा म्हणजे सारसबाग चौपाटी. या परिसरातील समाधान भेळ, संतोष भेळ ही भेळेची दुकानं लोकप्रिय आहेत. समाधान भेळ पर्वती पायथ्याच्या रस्त्याला, दांडेकर पुलाकडे जाताना लागणारं प्रसिद्ध दुकान. हे दुकान ५५ वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. मामा भेळवाले यांची ही भेळ मटकी भेळेसाठी प्रसिद्ध आहे. मुरमुरे, पापडी, शेव, बुंदी, खारे शेंगदाणे, भरपूर कांदा आणि अर्थातच भरपूर मटकी घालून ही भेळ केली जाते. ही मटकी हळद, मीठ घालून चांगली उकडलेली असते. यात वरून घातला जाणारा मसालाही ‘समाधान स्पेशल कांदा-लसूण मसाला’ असतो. सोबत उकडलेली मिरची असतेच. ठेचाही आवडीनुसार मिळतो. लिंबू पिळून, हाताने ही भेळ खाताना उत्तम चवीचा आनंद मिळतो, असं अनेक ग्राहक सांगतात. भांबरकर कुटुंबीयांच्या मालकीचे हे दुकान १९७० पासून सुरू आहे. इथल्या भेळेतलं फरसाण मालक स्वत:च तयार करतात. त्याच्या दर्जाकडे विशेष लक्ष देतात. पुण्यात सनसिटीजवळ यांची दुसरी शाखाही आहे.
सारसबाग चौपाटी परिसरातली आणखी एक प्रसिद्ध भेळ म्हणजे संतोष भेळ. किसनराव पवार यांच्या मालकीचे हे दुकान १९७८ पासून सारसबाग परिसरात आहे. आता संतोष हॉल (सिंहगड रोड), महर्षीनगर इथेही संतोष भेळेच्या शाखा सुरू झाल्या आहेत. कल्पना भेळ ही टिळक रोडवरची आणखी एक प्रसिद्ध व जुनी भेळ. ही भेळ १९४८ पासून पुणेकरांच्या सेवेत आहे. या भेळेची एक शाखा सहकारनगर परिसरातही आहे. टिळक रोडवर या भेळेच्या गाडीवर सत्तरच्या दशकात ‘दाढीवाल्या काकां’ची भेळ खाल्ली नाही, असे पुणेकर सापडणे कठीण. (याच गाडीशेजारी असलेल्या ‘उत्तम चाट भांडार’ या गाडीवर मिळणाऱ्या पाणीपुरीची चव चाखली नसेल असे पुणेकरही क्वचितच असतील. विशेषत: या गाडीवर ज्या आजी (त्यांचं नाव बहुतेक बेबीताई) असायच्या, त्यांच्याच हातची पाणीपुरी विशेष चवीची लागायची, असं अनेक पुणेकर छातीवर हात ठेवून सांगतील. हातची म्हणण्यापेक्षा चमच्याची, कारण या आजी पुरी कधीही हाताने पाण्यात बुचकळून द्यायच्या नाहीत. त्याऐवजी चमच्याने ते पाणी पुरीत भरून द्यायच्या. असो. हे जरा विषयांतर झालं.)
पुणे शहरात गल्लीबोळांत अक्षरश: शेकड्यानी भेळेच्या गाड्या किंवा दुकानं आहेत. स्थानिक लोकांत ते चांगलेच लोकप्रियही आहेत. गेल्या काही वर्षांत, विशेषत: सन २००० नंतर पुणे शहर अवाढव्य पसरलं आहे. निगडीपासून ते कात्रजपर्यंत आणि यवतपासून ते वाघोलीपर्यंत शहर प्रचंड वेगानं विस्तारलं आहे. निगडी प्राधिकरणातला एक चौक तर ‘भेळ चौक’ म्हणूनच प्रसिद्ध आहे. या सर्व ठिकाणच्या भेळेच्या दुकानांची दखल घ्यायची किंवा तिथली भेळ चाखायची तर आयुष्य पुरणार नाही. याशिवाय पुणे जिल्ह्याचा विचार केला तर भेळेच्या दुकानांची संख्या काही हजारांत निश्चितपणे जाईल. नगरहून येताना लोणीकंदजवळील सोमेश्वर मटकी भेळ, सरदवाडीची प्रसिद्ध भेळ, नाशिककडे जाताना चाकण-खेड दरम्यान भामा नदीवरचा पूल ओलांडल्यावर लागणारी तिथल्या स्थानिक भेळेची प्रसिद्ध दुकानं अशी किती तरी उदाहरणं सांगता येतील. पुण्यापासून मुंबई, सातारा, सोलापूर, नगर व नाशिक या सर्व महामार्गांवर आता भेळ व चाट पदार्थ देणारी मोठमोठी दुकाने उभारली गेली आहेत. ती सर्व वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण व त्यामुळं लोकप्रियही आहेत. या सर्वांचा आढावा या एकाच लेखात घेणं खरोखर अवघड आहे आणि एका व्यक्तीची ती मर्यादाही आहे. (त्यामुळं या लेखात काही प्रसिद्ध किंवा आपल्या आवडीच्या भेळेचे उल्लेख राहून गेले असतील, हे अगदी शक्य आहे.)
थोडक्यात, भेळ ही अशी आपल्या नेहमीच्या अळणी जगण्याला खमंग, चटकदार, लज्जतदार बनवणारी एक नामी चीज आहे. आपलं आयुष्य या भेळेतल्या चविष्ट घटकांसारखंच रुचकर आणि उत्तम व्हायला हवं, एवढी शिकवण तर भेळ आपल्याला देतेच!

इति भेळपुराण संपूर्णम्...

---

(पूर्वप्रसिद्धी : पुण्यभूषण दिवाळी अंक २-०२५)

---


2 Feb 2026

मटा पुणे दिवाळी अंक २५ - कथा

रघू अन् रायगडचा थरार
-----------------------------

यंदाच्या दिवाळीत ताडोबा अभयारण्यात जायचं, म्हणून रघू खूश होता. खरं तर त्याच्या शाळेचीच सहल जाणार होती. मात्र, नंतर ती बदलून रायगडावर नेण्याचं ठरलं. रघूला रायगडलाही जायचं होतं आणि ताडोब्यालाही! मात्र, रघूच्या वडिलांनी शाळेच्या सहलीतून रायगडला जा, असं सांगितलं. ताडोबा अभयारण्याला पुढच्या वर्षी नक्की जाऊ, म्हणून रघूच्या बाबांनी त्याची समजूत काढली. त्या दिवशी रघू ताडोब्यातील वाघांची स्वप्नं रंगवतच झोपी गेला... मात्र, स्वप्नात कधी इंटरव्हल झाला ते रघूला कळलंच नाही. न बघितलेल्या ताडोबाची फिल्म जरा जरा ब्लर होत फेड आउट झाली आणि एकदम सह्याद्रीचा एक उंच डोंगर तिथं हळूहळू प्रकट होऊ लागला... आधी निळं आकाश, मग जमीन, त्यावर हिरवेगार डोंगर... ती माची... आणि एकदम त्याला दिसला तो - रायगड. हो, राजांचा गड... हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड. दुर्गांचा दुर्ग, उत्तुंग, बेलाग असा रायगड... रघू एकदम जागा झाला... त्याला नुकतीच झालेली ती सहल आता पुन्हा आठवू लागली...
...त्यांची रायगडची सहल अगदी थरारक झाली होती. रघू पहिल्यांदाच रायगडला गेला होता. त्याला व त्याच्या ग्रुपला खरं तर पायऱ्या चढून गडावर जायचं होतं. मात्र, देशमुख सरांनी डोळे वटारल्यावर सगळी मुलं गप्पच बसली. अर्थात रोप-वेनं जाण्याचा थरारही मस्तच होता. विशेषत: अगदी शेवटी दहा-वीस मीटर अंतर राहिलं असताना ती छोटीशी ट्रॉली आता समोरच्या कातळाला धडकतेच की काय, असं वाटून रघूच्या छातीत धस्स झालं होतं. मात्र, एकदम एक झोका बसला आणि ती ट्रॉली एकदम झुमकन वरच्या डेकवर पोचली होती. सगळा गड हिंडून बघताना रघूला फारच भारी वाटलं होतं. त्याला चौथीत, म्हणजे आधीच्याच वर्षी इतिहासाला ‘शिवछत्रपती’ हेच पुस्तक होतं. त्या पुस्तकावरचं राजा रविवर्मांनी काढलेलं महाराजांचं चित्र रघू कितीदा तरी निरखून पाही. महाराजांकडं नुसतं बघितलं, की रघूला एकदम वेगळं असं, काही तरी ग्रेट वाटत असे. त्याच्या हडकुळ्या दंडात एकदम हत्तीचं बळ आलंय की काय, असं वाटे. हे असं आपल्यालाच होतं, की बाकी मित्रांनाही होतं हे त्याला कळत नव्हतं. एकदा धीर करून त्यानं त्याचा खास मित्र सदूला विचारलं होतं. सदूलाही तसंच होतं, हे कळल्यावर रघूला हुश्श झालं होतं. रायगडावर दिवस कसा गेला, ते कळलंच नव्हतं. महाराजांच्या सिंहासनावर बसलेल्या पुतळ्याकडं बघून रघूचा आख्खा वर्ग थक्क झाला होता. नंतर सर्वांनी ‘छत्रपती शिवाजीमहाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांनी तो परिसर दणाणून सोडला होता. आजूबाजूला आलेले इतर पर्यटकही या पोरांकडं कौतुकानं बघत होते. पुढं होळीच्या माळावर, बाजारपेठेत, गंगासागर तलावावर, जगदीश्वर मंदिरात... सगळीकडं मुलांचा हा जयघोष कायम राहिला. सगळ्यांना आता टकमक टोक बघायची उत्सुकता लागली होती. बरीच मजल, दरमजल करत मुलं तिथं पोचली, तेव्हा त्या टोकावरून महाराष्ट्राच्या सह्याद्रीचं ते भव्य दर्शन बघून सगळ्यांचेच डोळे तृप्त झाले. किती फोटो काढावेत अन् किती नाही, असं मुलांना होऊन गेलं. रघूनं त्याच्या बाबांचा खास कॅमेरा आणला होता. त्यातून तो भराभर फोटो काढत होता. फोटो काढण्यात तो एवढा गुंगून गेला, की शेवटी त्याच्या मित्रानं - सदूनं त्याला ढोसून हलवलं आणि त्या तंद्रीतून जागं केलं. बाकीची मुलं जरा पुढं निघाली होती. देशमुख सरांनी लांबूनच हाक मारली. हे दोघं दिसताच तेही जरा निवांत झाले आणि पुढं चालू लागले.


‘आपण इथं हरवलो तर...’ सदू एकदम म्हणाला.
त्यावर रघू एक क्षण दचकला, पण नंतर त्याला हसू आलं. त्यानं सभोवती पाहिलं. दुपारचे अडीच-तीन वाजले होते. गडावर ऊन होतं, पण गार वारंही सुटलं होतं. त्यामुळं एकूण छान वाटत होतं. मुळात ही महाराजांची राजधानी, त्यामुळं इथं कसलं भय वाटतच नाहीय, असं त्याला एकदम लक्षात आलं. मगाशी सरांनी हिरकणीची कथाही सांगितली होती. ती कथा खरी आहे, की दंतकथा आहे हा वाद सोडून द्या; त्या गोष्टीतलं मर्म लक्षात घ्या, असंही सरांनी सांगितलं होतं.
‘सदू, एक तर सर दर तासाने सर्व मुलांचा काउंट घेतात. शिवाय आपल्याला घेतल्याशिवाय ते कसे परत जातील? शिवाय आपल्याकडं हे बटणाचे का होईना, मोबाइल आहेत, त्यामुळं आपण इथं हरवण्याची शक्यता मुळीच नाही. कळलं का?’ रघू सदूकडं पाहत हसत म्हणाला. त्यावर सदू जरासा खट्टूच झाल्यासारखा वाटला. जणू काही, इथं आपण हरवायला हवं, असंच त्याला वाटत होतं की काय, कोण जाणे!
रघू मात्र इतिहासात हरवला होता. राजांच्या काळातल्या एकेक गोष्टी त्याला आठवत होत्या. इतिहासाचं पुस्तक, पुण्यात नुकतीच पाहिलेली ‘शिवसृष्टी’, त्याच्या बाबांनी आणलेली इतर काही पुस्तकं, यूट्यूबवरची काही भाषणं असं सगळं ऐकून रघूला महाराजांच्या एकूण कार्यकर्तृत्वाविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झालं होतं. त्या इतिहासातल्या सगळ्याच गोष्टी त्याला कळल्या होत्या, असं नव्हे. मात्र, इतिहास शिकवायला देशमुख सरांसारखे फार चांगले शिक्षक लाभल्यामुळं त्याला पुस्तकापलीकडल्या बऱ्याच गोष्टीही समजत होत्या. शिवरायांकडून घेण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजांचं प्रसंगावधान, हे रघूच्या मनावर फार बिंबलं होतं. अनेक संकटांवर मात करण्याची ताकद महाराजांना त्यांच्या या प्रसंगावधानानं व अष्टौप्रहर जागृत असण्याच्या वृत्तीनंच दिली होती, यात शंका नाही असंच रघूला मनोमन वाटत होतं.
आता गड उतरायची वेळ झाली होती. रोप-वे संध्याकाळी विशिष्ट वेळी बंद होत असल्यानं सर सर्वांना लवकर निघायची घाई करत होते. गडावरून खाली उतरणारी शेवटची टीम रघूच्या शाळेची होती. रघूला उतरायची घाई नव्हती. त्याला गडावर जास्तीत जास्त काळ थांबायचं होतं. त्यामुळं तो व सदू रांगेत सर्वांत मागे थांबले. आठ-आठच्या तुकडीनं मुलं दोन्ही पाळण्यांत बसून खाली जात होती. देशमुख सरांना पुढील व्यवस्था करायची होती, म्हणून ते दुसऱ्या की तिसऱ्या बॅचबरोबरच खाली उतरले. शेवटच्या तुकडीत आणि शेवटच्या पाळण्यात फक्त रघू व सदू उरले. त्यामुळं त्यात त्या दोघांनाच बसवण्यात आलं. अगदी थोडं पुढं असलेल्या दुसऱ्या पाळण्यात शाळेतली इतर सात-आठ मुलं बसली होती. रोप-वेतून ते दोन्ही पाळणे आता हळूहळू खाली उतरू लागले. भन्नाट वारा वाहत होता. त्यामुळं ते पाळणे थोडेसे हलत होते. निम्म्या अंतरावर गेल्यावर ते पाळणे अचानक थांबले. थोडा वेळ मुलं तशीच स्वस्थ बसली. रोप-वे असा मधेच थांबणं नॉर्मल आहे का नाही, याची त्या मुलांना काही कल्पना नव्हती. रघू आजूबाजूला पाहत होता. मागे रायगडाचा भक्कम, बुलंद असा कठीण कडा आणि समोर लांबवर पसरलेले सह्याद्रीचे भव्यदिव्य डोंगर, लांबवर तळात दिसणारी रायगडवाडी आणि रोप-वेचं चिमुकलं बोर्डिंग स्टेशन आणि या सगळ्यांत मध्येच अंतराळात तरंगत असलेल्या त्या दोन ट्रॉल्या...
थोडा वेळ गेला... आणखी थोडा वेळ गेला... दोन्ही पाळणे तसेच हवेत स्थिर लटकत होते आणि त्यात ही नऊ-दहा लहान मुलं! आता मात्र सदूला थोडी भीती वाटू लागली. पाळणा हळूहळू खाली जाताना सभोवती पाहताना काही वाटत नव्हतं. मात्र, आता त्या एका जागी स्थिर थांबलेल्या पाळण्यातून खाली नजर जरी तरी गरगरून चक्कर येईल, असं वाटू लागलं. मुलांकडं त्यांच्या सॅक होत्या. मात्र, सगळा खाऊ गडावरच संपला होता. खाली उतरलं, की मुलांना थोड्या वेळात लगेच जेवायचंच होतं. रघूच्या सॅकमध्ये अगदी दोन बिस्किटं आणि थोडं पाणी उरलं होतं. रघूनं ते बघून घेतलं. ‘सदू, तुला पाणी हवंय का?’ रघूनं काळजीनं विचारलं. सदू पटकन ‘हो’ म्हणाला आणि त्यानं ते उरलंसुरलं पाणीही पिऊन टाकलं. आता त्यांच्याकडं पाणी नव्हतं. किती वेळ गेलाय हे कळत नव्हतं. मुलांकडं घड्याळं होती, बटणाचा मोबाइलही होता. मात्र, तो काढून बघण्याचं कुणाला सुचेल तर ना! आधी सुरू असलेला दंगा एकदम गप्प झाला होता. आता काही काही मुलांना रडू येण्याच्या बेतात होतं. रघूला भीती वाटत नव्हती, मात्र थोडी काळजी वाटू लागली होती. ‘आपण महाराजांच्या गडावर आहोत, आपल्याला काही होणार नाही,’ असं त्याला मनोमन वाटत होतं. मगाशी गडावर सांगितल्या गेलेल्या महाराजांच्या एकेक गोष्टी, त्यांचं प्रसंगावधान तो आठवू लागला. त्याला एकदम आठवलं, की आपल्याकडं मोबाइल आहे. त्यानं पटकन खिशातून मोबाइल काढला आणि तो देशमुख सरांना फोन करू लागला. पण... अरे देवा! तिथं मोबाइलला रेंजच नव्हती. खूप वेळ प्रयत्न करूनही फोन लागेना. शिवाय त्याची बॅटरीही संपत चालली होती. आता काय करावं? खालच्या ट्रॉलीत कुणाकडं मोबाइल आहे का, हे विचारावं म्हणून तो मागं वळला आणि त्यानं जरा ओरडून विचारलं, ‘ए राजा, दिन्या, पार्थ... कुणाकडं मोबाइल आहे का रे?’ मात्र, तिथं वारा एवढा जोरात वाहत होता, की खाली काहीच ऐकू जाईना. शिवाय रघू अचानक उठून मागं वळल्यानं त्यांची ट्रॉली एकदम हलली आणि जोरदार हलायला लागली. ते बघून सदूनं दोन्ही दांड्यांना हात घट्ट धरले आणि तो रडायलाच लागला. ते बघून रघूही थोडा घाबरला; पण क्षणभरच! नंतर लगेच सावरून त्यानं पुढचा विचार करायला सुरुवात केली. प्रसंगावधान, प्रसंगावधान... त्याच्या डोक्यात तेच शब्द घुमत होते. त्यानं सॅकमध्ये हात घातला. त्याच्या हातात एक टिश्यू पेपर लागला. त्याच्याकडं पेन होतंच. मग त्यानं त्या टिश्यू पेपरवर ‘तुमच्यापैकी कुणाकडे मोबाइल आहे का?’  असं लिहून तो कागद बोळा करून, खालच्या ट्रॉलीत फेकायचा प्रयत्न केला. पण वारा एवढा जोरात होता, की तो बोळा कुठल्या कुठं भिरकावला गेला. रघूला आता अगदी हताश वाटलं. खरं तर खालच्या ट्रॉलीतील मुलांनी स्वत: डोकं चालवून सरांना फोन लावला असेलच की... मग ती पोरं काहीच बोलत नाहीयेत... नुसतीच घाबरली आहेत... आता काय करावं... रघूच्या मनात विचारचक्र सुरू झालं. त्यानं सॅकमध्ये पुन्हा हात घातला. त्याला लहान चेंडूसारखं काही तरी लागलं. बघतो तर काय, बेसनाचा लाडू! त्याच्या आईनं डब्यात दिलेला. रघूला अतिशय आनंद झाला... त्यानं पुन्हा एक टिश्यू पेपर घेतला, त्यावर वरचा मेसेज पुन्हा लिहिला आणि त्यात लाडू ठेवून तो अगदी अलगद खालच्या ट्रॉलीत फेकला... सदैवानं वारा जरा पडला होता. त्यामुळं तो लाडू व ती चिठ्ठी अगदी नेमकी खालच्या ट्रॉलीत पडली. मुलांनी ती उचलून वाचली. त्यातल्या राजानं मोठमोठ्यानं हातवारे करून काही तरी सांगायला सुरुवात केली. मात्र, परत जोरात वाहायला लागलेल्या वाऱ्यामुळं काहीच ऐकू येईना. शेवटी हातवारे करून राजानं काही तरी सांगितलं. ते बघून रघूला एवढंच समजलं, की त्यांनी सरांना लगेचच फोन केला होता. पण सरांचं बोलणं यांना ऐकूच आलं नाही. मात्र, सरांना ही मुलं अडकून पडल्याचं अर्थातच माहिती होतं. आता हे ऐकून रघूला काय करावं ते सुचेना. त्यानं सरळ ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. सदूनं रडणं थांबवून त्याच्या आवाजात आवाज मिसळला. ती गर्जना मात्र खालच्या मुलांना ऐकू गेली आणि त्यांनीही तशाच घोषणा द्यायला सुरुवात केली. तिसऱ्या घोषणेनंतर ट्रॉली एकदम हलली. मुलं परत घाबरली... त्यांनी समोरचा दांडा घट्ट धरला. मात्र, काही सेकंदांतच त्यांना कळलं, की ट्रॉली खाली खाली जाऊ लागलीय... मुलांना एकदम आनंद झाला. त्यांनी आणखी मोठ्या आवाजात घोषणा द्यायला सुरुवात केली. अवघ्या पाच ते सात मिनिटांत मुलं खालच्या बोर्डिंग स्टेशनला पोचलीसुद्धा. खाली गेल्यावर समोरच उभ्या असलेल्या देशमुख सरांनी सर्व मुलांना जवळ घेतलं. सरही रडवेले झाले होते. सदूसह काही काही मुलं तर रडायलाच लागली होती. रघूला मात्र प्रश्न पडला होता, की ट्रॉली मध्येच का थांबली? त्यानं लगेच सरांकडं धाव घेऊन त्यांना तसं विचारलंही. त्यावर सर म्हणाले, की हा रोप-वे अतिशय सुरक्षित आहे. तो एरवी कधीही बंद पडत नाही किंवा कधी काही तांत्रिक अडचण आली, तर अगदी पाच मिनिटांत तो पुन्हा सुरू होतो. आताही तो पाच ते दहा मिनिटांत परत सुरू झाला...
रघूला हे ऐकून आश्चर्य वाटलं. म्हणजे? आपण केवळ दहा मिनिटं अडकून पडलो होतो? आणि तरीही आपल्याला ते असं मधेच हवेत लटकल्यावर किती काय काय वाटून गेलं! सगळ्यांना किती भीती वाटली!
आणि महाराज... त्यांच्या आयुष्यात तर एकाहून एक जीवावरची संकटं आली. मात्र, त्यांनी कधीही हार मानली नाही किंवा त्यांना कधीही कसली भीती वाटली नाही. प्रसंगावधान आणि कूटनीतीमुळं ते सर्व संकटांतून बाहेर पडले. मग ती आग्र्याहून सुटका असो किंवा पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटणं असो. हे आठवून रघूचं मन भरून आलं. त्यानं पुन्हा एकदा रायगडाच्या त्या भव्य विस्ताराकडं पाहिलं आणि मनोमन हात जोडले.
खालच्या ट्रॉलीतले मित्र भेटले आणि त्यांची थट्टामस्करी सुरू झाली. दिन्या एकदम म्हणाला, ‘रघू, थँक्यू रे... बेसनाचा लाडू फार छान होता...’ सगळे हसले. देशमुख सरही हसून म्हणाले, ‘अहो अंतराळवीर, चला... बस वाट बघतेय आणि तिकडं पुण्यातही आपलं घर आपली वाट बघतंय... चला...’
रघू आणि सदू बसमध्ये बसले. बस भन्नाट वेगात पुण्याकडं निघाली. खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यामुळं रघूला झोप लागली. झोपेत त्याला पुन्हा स्वप्न पडलं. स्वप्नात तो ताडोबा अभयारण्यात पोचला होता... एका पाणवठ्यावर तो उभा होता. आजूबाजूला कोणीही नव्हतं. त्यानं सहज मागं पाहिलं तर दहा फूट अंतरावर झाडाच्या खोडाआडून एक भलामोठा वाघ - हा बहुतेक ‘छोटा मटका’ होता - त्याच्याकडंच रोखून बघत होता... आता? रघू काय करणार?
‘प्रसंगावधान, प्रसंगावधान...’ रघू किंचाळत ओरडत उठला. सदू त्याच्याकडं आश्चर्यानं बघत होता. ‘काय झालं रे?’ त्यानं काळजीनं विचारलं.
रघूनं आजूबाजूला पाहिलं. तो बसमध्येच होता. वाघबिघ कुणी नव्हतं. आता बाहेर अंधार पडला होता... रायगड किल्ला मागे पडला होता आणि रघू मनातल्या मनात हसत होता... म्हणत होता, ‘महाराज, तु्म्ही असेच सतत मनात राहायला येत जा...’

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे दिवाळी अंक २०२५)

----

29 Jan 2026

मनशक्ती बालकुमार दिवाळी २५ - लेख

चौसष्ट घरांची ‘राणी’
------------------------


माणसाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विविध गुणांची आवश्यकता असते. त्या माणसाचे वैयक्तिक कष्ट, इप्सित ध्येय साध्य करण्याची तीव्र इच्छा, त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी, ध्येयाकडे जाण्याचे योग्य नियोजन, कार्यसाधनेतील एकाग्रता या सर्व गोष्टींचे एकत्रित फळ म्हणून आपल्याला यश मिळते. आपल्याला यशस्वी होण्यासाठी जगातील अनेक यशस्वी लोकांच्या कथा प्रेरणा देत असतात. या लोकांचा यशाकडे झालेला प्रवास, त्या मार्गात आलेल्या अडथळ्यांवर त्यांनी कशी मात केली याचे अनुभव, यश मिळविण्यासाठी घेतलेली मेहनत या सर्व बाबी आपल्यालाही तसेच यश मिळविण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. क्रीडा क्षेत्रात आपल्याला अशा अनेक यशोगाथा ऐकायला मिळतात. अगदी भारतापुरते बोलायचे झाले तर ‘हॉकीचे जादूगार’ मेजर ध्यानचंद यांच्यापासून ते महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यापर्यंत अनेक खेळाडूंची उदाहरणे देता येतील. क्रिकेटमध्येच सुनील गावसकर किंवा अगदी अलीकडच्या काळातील एम. एस. धोनी, विराट कोहली वा रोहित शर्मा, या सर्वांनी प्रचंड चिकाटीने, मेहनतीने त्यांच्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळविल्याचे दिसते. बॅडमिंटनमध्ये प्रकाश पदुकोण यांच्यापासून साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधूपर्यंत पुष्कळ अशीच उदाहरणे सांगता येतील. मैदानी स्पर्धांमध्येही मिल्खासिंग, पी. टी. उषा यांच्यापासून ते नीरज चोप्रापर्यंत अनेक खेळाडूंनी आपल्या खेळाद्वारे देशाची प्रतिष्ठा उंचावली आहे. या सर्व खेळाडूंच्या यशात एक गोष्ट समान दिसेल - ती म्हणजे त्यांची अविचल, अढळ कार्यसाधना!


या लेखात बुद्धिबळात सर्वोच्च यश मिळविणारी मराठमोळी मुलगी दिव्या देशमुख हिच्या कार्यसाधनेविषयी जाणून घेऊ या. बुद्धिबळ हा खेळ आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. या खेळाच्या नावाप्रमाणेच यात बुद्धीचा कस लागतो. या खेळाचा उगम प्राचीन भारतातच झाला असं म्हणतात. त्यामुळे आपला भारत देश हेच या अद्भुत खेळाचे जन्मस्थान आहे, असं मानायला हरकत नाही. पूर्वी त्याला ‘चतुरंग’ असं नाव होतं. साधारण सहाव्या शतकापर्यंत मागे या खेळाचा इतिहास सांगता येऊ शकतो. तत्कालीन हिंदुस्थानातील सैनिकांनी हा खेळ देशाबाहेर नेला. त्यानंतर पर्शिया (आताचा इराण) देशात तो ‘शतरंज’ या नावाने खेळला जाऊ लागला आणि तिथूनच त्याचा जगभर प्रसार झाला असं मानण्यात येतं.
आधुनिक काळातही बुद्धिबळ या खेळात भारत आता एक महाशक्ती म्हणून उदयास येत आहे. एके काळी सोविएत महासंघाचा या खेळात दबदबा होता. याशिवया युरोपीय देशांतील अनेक खेळाडूही नावलौकिक राखून होते. भारतात अलीकडच्या काळात विश्वनाथन आनंद या खेळाडूपासून आधुनिक भारतीय बुद्धिबळाच्या वर्चस्वाचे पर्व सुरू झाले, असे मानले जाते. विश्वनाथन आनंद हा भारताचा पहिला ग्रँडमास्टर. त्याने १९८८ मध्ये हा मान मिळवला. आधुनिक बुद्धिबळात ‘ग्रँडमास्टर’ हा सर्वांत मोठा किताब मानला जातो. त्यासाठी काही विशिष्ट ‘एलो’ गुणांचा टप्पा पार करावा लागतो. सहसा २६०० ते २८०० गुणांपर्यंत जाणारे मोजके खेळाडूच ‘ग्रँडमास्टर’ होऊ शकतात. आतापर्यंत फारच थोड्या खेळाडूंना हा टप्पा गाठता आला आहे. त्यापैकी विश्वनाथन आनंद उर्फ ‘विशी’ हा एक. विशीच्या या उत्तुंग यशामुळे भारतातील बुद्धिबळ खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली. आनंद याच्यानंतर आतापर्यंत भारताचे केवळ ८८ खेळाडू ग्रँडमास्टर किताब मिळवू शकले आहेत, यावरून ‘ग्रँडमास्टर’ होणे किती कठीण असेल, याचा अंदाज येईल.
अगदी अलीकडे म्हणजे या वर्षी जुलै महिन्यात भारताची ८८ वी ग्रँडमास्टर होण्याचा मान नागपूरच्या दिव्या देशमुखने मिळवला. दिव्याची भव्य कामगिरी ही, की तिने महिलांची बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा जिंकून थेट ‘ग्रँडमास्टर’ किताबाला गवसणी घातली. गेल्या २८ जुलैला तिने महिलांच्या या विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हम्पीचा टायब्रेकरमध्ये पराभव केला आणि विश्वविजेतेपदावर स्वत:चे नाव कोरले. (त्यानंतर ऑगस्टमध्ये भारताचा रोहित कृष्णा ८९वा ‘ग्रँडमास्टर’ झाला आहे.) दिव्याच्या आधी कोनेरू हम्पी, आर. वैशाली व हरिका द्रोणावली या केवळ तीन भारतीय महिलांनाच ग्रँडमास्टर किताब मिळविता आला आहे, यावरूनही दिव्याच्या कामगिरीचे मोठेपण लक्षात येईल.
दिव्या अवघी १९ वर्षांची आहे. तिचा जन्म नऊ डिसेंबर २००५ रोजी नागपुरात एका मराठी कुटुंबात झाला. तिचे वडील जितेंद्र व आई नम्रता हे दोघेही डॉक्टर आहेत. नागपुरातील भवन्स भगवानदास पुरोहित विद्यामंदिरात तिचं शालेय शिक्षण झालं. दिव्या अगदी लहान वयापासून, म्हणजे पाचव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळते आहे. तिची आई डॉ. नम्रता यांनी सांगितल्याप्रमाणे, तिला आधी बुद्धिबळात रस नव्हता. तिची मोठी बहीण बॅडमिंटन खेळायला जायची, म्हणून दिव्याही बॅडमिंटन खेळायला जायचा हट्ट करायची. मात्र, लहानग्या दिव्याला बॅडमिंटनची रॅकेट पेलवत नसे. त्यामुळं तिला शेजारीच असलेल्या बुद्धिबळ अॅकॅडमीत घालण्यात आलं. मात्र, तिला तिथं बुद्धिबळाची गोडी लागली आणि लवकरच ती या खेळात अगदी पारंगत झाली. बुद्धिबळ हा अतिशय एकाग्र होऊन, लक्ष केंद्रित करून खेळायचा खेळ आहे. अगदी लहान असल्यानं दिव्याला तसं एकाग्र होऊन खेळणं स्वाभाविकच जमायचं नाही. मात्र, तिच्या पालकांनी तिला खूप प्रोत्साहन दिलं. न कंटाळता, न थकता, ते तिच्याकडून सराव करून घ्यायचे. त्यामुळं दिव्या खूप लवकर बुद्धिबळ खेळात तयार झाली. तिला अवघ्या आठव्या वर्षी, म्हणजे २०१३ मध्ये ‘फिडे’कडून (बुद्धिबळ खेळाची आंतरराष्ट्रीय संघटना) मास्टर पदवी मिळाली. मग २०१८ मध्ये ती महिला आंतरराष्ट्रीय मास्टर झाली. त्यानंतर ती भारताकडून अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली. सन २०२० मध्ये फिडे ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक मिळविणाऱ्या भारतीय संघात ती होती. नंतर २०२२ मध्ये तिने राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावलं. यानंतर दिव्यानं मागं वळून बघितलं नाही. तिच्या या खेळातली घोडदौड जोरात सुरू झाली. तिने २०२३ मध्ये आशियाई महिला बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. त्यानंतर भारतातील महिलांच्या जलद बुद्धिबळ स्पर्धेतही तिने बाजी मारली. या स्पर्धेत तर तिला सर्वांत कमी मानांकन होते. तरीही तिने हरिका द्रोणावली, वंतिका अगरवाल, कोनेरू हम्पी, सविता श्री बी., इरिना क्रुश अशा नामवंत खेळाडूंचा पराभव केला होता. जून २०२४ मध्ये ती वीस वर्षांखालील गटातील वर्ल्ड चॅम्पियन झाली. सौम्या स्वामीनाथन, हरिका द्रोणावली व कोनेरू हम्पी यांच्यानंतर अशी कामगिरी करणारी ती चौथी भारतीय महिला ठरली. अंतिम फेरीत तिनं बल्गेरियाच्या तृतीय मानांकित बेलोस्वावा क्रस्टेव्हा हिला पाच तासांहून अधिक चाललेल्या मॅरेथॉन लढतीत पराभूत केलं होतं. यानंतर ४५ व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताला सांघिक सुवर्णपदक मिळवून देताना तिनं चमकदार विजय मिळवला होता. याच स्पर्धेत तिनं वैयक्तिक सुवर्णपदकाचीही कमाई केली होती.
यंदा जॉर्जिया देशात बाटुमी या शहरात झालेल्या जागतिक विजेतेपद स्पर्धेत दिव्याला १५ वे मानांकन देण्यात आले होते. तिने चौथ्या फेरीत द्वितीय मानांकित झू जिनेर हिचा पराभव केला. उपउपांत्य फेरीत तिने भारताच्याच हरिका द्रोणावलीला हरवलं. उपांत्य लढतीत तिने चीनच्या तान झोंगयी हिच्यावर मात केली आणि अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. अंतिम फेरीत वर उल्लेख आला आहे त्याप्रमाणे भारताच्याच कोनेरू हम्पीला हरवून ती विश्वविजेती ठरली. एवढ्या लहान वयात कुशाग्र बुद्धीच्या दिव्याने बुद्धिबळ या खेळात मोठी चमक दाखवली आहे.
दिव्याच्या या यशामध्ये तिच्या जिद्दीचा, कार्यसाधनेचा अर्थातच मोठा वाटा आहे. एखादा माणूस यशस्वी झाला, असं आपण केव्हा म्हणतो? एखाद्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान, पुरस्कार वा किताब मिळणं ही या यशाची एक पोचपावती असते. त्या स्थानापर्यंत जाण्यासाठी अनेक अडथळे असतात. कष्ट असतात. कुठलंही यश सहजासहजी मिळतच नाही. दिव्यानेही बुद्धिबळासारख्या सर्वोच्च बुद्धिमत्तेची आवश्यकता असलेल्या खेळात अशाच कष्टाने, साधनेने यश मिळविले आहे. त्यामागे तिच्या पालकांची मेहनत तर आहेच; पण स्वत: दिव्यानेही विलक्षण जिद्दीने आणि कठोर मेहनतीने हे यश प्राप्त केले आहे, यात शंका नाही. दिव्याने बुद्धिबळात लक्ष केंद्रित करायचे ठरवल्यावर तिच्या नियमित अभ्यासाकडेही दुर्लक्ष केले नाही. मुळातच ती एक हुशार विद्यार्थिनी असल्याने दहावी व बारावी या बोर्ड परीक्षाही ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. अनेकदा तर स्पर्धेच्या काळात, दोन सामन्यांच्या दरम्यान तिने शाळेचा अभ्यास केला आहे. वास्तविक त्या सामन्याचेही एक निराळे दडपण तिच्यावर असणारच. मात्र, तिने बुद्धिबळ व शाळेचा अभ्यास या दोन्हींकडे नीट लक्ष दिले व दोन्हींवर अन्याय होऊ दिला नाही. सध्या मात्र ती विविध स्पर्धांमध्ये एवढी व्यग्र आहे, की पुढचे शिक्षण दूरस्थ पद्धतीने घेण्याचा निर्णय तिने घेतला आहे.

कुठल्याही खेळात खेळाडूंच्या शारीरिक व मानसिक सक्षमतेची कसोटी लागते. बुद्धिब‌ळासारख्या खेळात तर खेळाडूंच्या मानसिक सक्षमतेची जणू परीक्षाच पाहिली जाते. मानसिक कणखरणा नसेल तर कुणीही खेळाडू बुद्धिबळात टिकूच शकणार नाही. त्यातही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळायचे असेल, तर अत्यंत उच्च दर्जाची मानसिक तयारी करावी लागते. याशिवाय नियमित सरावही महत्त्वाचा असतो. समोरचा प्रतिस्पर्धी कोण आहे, कसा आहे, त्याचं आधीचं रेकॉर्ड कसं आहे हे सर्व बघावं लागतं. अतिशय आधुनिक अशा संगणकांवर बुद्धिबळाचे अनेक डाव तयार केले जातात. आतापर्यंत विविध स्पर्धांत खेळले गेलेले डावही संगणकावर अभ्यासता येतात. किंबहुना, संगणकही बुद्धिबळ ‘खेळतो’, हे आता सर्वज्ञात आहे. संगणकाबरोबर बुद्धिबळ खेळून त्याला हरवून दाखवणं ही फारच उच्च कोटीची कामगिरी मानली जाते. याचे कारण जगातील सर्वोत्तम खेळाडूंच्या उत्तमोत्तम डावांचा, चालींचा, डावपेचांचा अभ्यास करून संगणकाच्या खेळाचा ‘प्रोग्राम’ तयार केला जातो. संगणकाच्या सर्व चाली अशा गणिती पद्धतीने व अचूक तयार केलेल्या असल्याने, त्या ओळखून, त्याला कोड्यात पाडता येईल अशा प्रतिचाली रचणे, तसा विचार करू शकणे हे अत्यंत अव्वल बुद्धिमत्ता असलेले खेळाडूच करू शकतात. दिव्या ही अशा प्रकारची खेळाडू आहे. बऱ्याच खेळाडूंना जन्मत:च काही विशिष्ट कौशल्यांची (उदा. वेगात आकडेमोड करता येणे) देणगी असते. बुद्धिबळ खेळू शकणाऱ्या खेळाडूंचा मेंदूही अशा काही विशिष्ट, दैवदत्त कौशल्यांनी युक्त असतो. त्याचा त्यांना खेळताना फायदा होत असला, तरी अनेकदा समोरचे खेळाडूही तसेच व तितकेच तयारीचे असल्याने, वैयक्तिक कठोर मेहनत व प्रचंड पूर्वतयारी यांना पर्यायच नसतो. दिव्याचे भव्य यश म्हणजे अशाच अत्यंत कठीण व्रताचे फळ आहे, असेच म्हणावे लागेल.
दिव्याची ही कहाणी वाचल्यावर असं वाटतं, की आपण कुणीही आपल्या आयुष्यात दिव्यासारखं भव्य यश मिळवू शकतो. मात्र, त्यासाठी कुठल्या तरी एका क्षेत्राची अतिशय मनापासून आवड असायला हवी आणि त्या क्षेत्रातील सर्वोत्तम स्थान मिळविण्यासाठी अफाट मेहनत करायची तयारीही हवी. कार्यमग्नतेचा ध्यास आणि कार्यसाधनेची आस घेऊन आयुष्यात पुढं जाण्याची जिद्द हवी. अशा जिद्दीने कष्ट केल्यास यश आपल्या पायाशी नक्की लोळण घेईल, यात अजिबात शंका नाही.

---

(पूर्वप्रसिद्धी : मनशक्ती बालकुमार दिवाळी अंक, २०२५)

---

27 Jan 2026

समदा दिवाळी अंक २५ - लेख

स्वप्नांचं ‘टेकऑफ’...
-------------------------

आपल्या आयुष्यात स्वप्न हा प्रकारच नसता तर आयुष्य भलतंच नीरस झालं असतं. आपण स्वप्न पाहू शकतो, म्हणून आजचा दिवस काढू शकतो. एखादं स्वप्न पाहणं, कुठलं तरी उद्दिष्ट ठेवणं, जिद्दीनं ते पूर्ण करणं हा सगळा प्रवास म्हणजेच खरं तर आपलं आयुष्य असतं, असंही म्हणायला हरकत नाही.
आता इथं स्वप्न याचे दोन अर्थ संभवतात. एक आपल्याला झोपेत पडतं ते आणि दुसरं म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो, ती पूर्ण व्हावी म्हणून धडपडतो ते... पण या दोन्हींचा एकमेकींशी अन्योन्य संबंध आहे. कसा? आपण झोपेत पडणारं स्वप्न पाहायला कधीपासून सुरुवात करतो बरं? आपण अगदी तान्हं बाळ असतानाही आपल्याला तसं स्वप्न पडत असणार. आता ते काही आपल्याला आठवणार नाही; पण अनेक लहान बाळं झोपेतल्या झोपेत खुदकन हसताना दिसतात, तेव्हा ती काय बघत असतील? कसला विचार करत असतील? काय दिसत असेल त्यांना? माहिती नाही. पण खूप लहानपणापासून आपण स्वप्नं पाहतो, हे नक्की. स्वप्न म्हणजे अबोध मनाच्या राज्यातला प्रदेश. आपल्या अबोध मनात जे काही विचार चालू असतात किंवा जे काही आपल्याला वाटत असतं, तेच स्वप्नांच्या रूपात दिसतं म्हणे. आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे किंवा एखादं पद हवं आहे किंवा बढती हवी आहे किंवा बंगला-गाडी-घोडा असं जे जे काही भौतिक हवं आहे ते ते आपल्याला स्वप्नात कधी ना कधी तरी दिसतं. त्यामुळंच आपल्या भाषेत स्वप्न याचा एक अर्थ मनातील इच्छा, आकांक्षा किंवा नुसतीच आशा असा आहे.
त्यामुळं अशा स्वप्नांविषयी बोलायचं तर ते काही अशा एखाद्या लेखात मावायचं नाही. अशी किती तरी स्वप्नं पाहिली! स्वप्नं पाहण्यावर अजून तरी कुणाची बंदी नाही. त्यामुळं हवी तेवढी स्वप्नं पाहावीत. ती पूर्ण होतील किंवा न होतील; किंबहुना बरीचशी तर नाहीच होणार. मग काय करायचं? काही नाही; स्वप्नं पाहत राहायचं. एक ना एक एखादं तरी स्वप्न पूर्ण होतंच, असा माझा अनुभव आहे.
यातल्या काही महत्त्वाच्या स्वप्नांचे, स्वप्नपूर्तीचे अनुभव सांगायलाच हवेत. यातलं पहिलं सर्वांत महत्त्वाचं माझं स्वप्नहोतं ते ड्रायव्हर व्हायचं! हो, ड्रायव्हर... तोही एसटीचा ड्रायव्हर! (बहुतेक मुलग्यांचं हे स्वप्न असतंच!) त्या वेळी सार्वजनिक प्रवासी वाहनांतूनच बहुसंख्य मध्यमवर्गीय लोक प्रवास करायचे. त्यामुळं एसटीचा प्रवास नित्याचाच. अनेक लहान मुलांना ड्रायव्हरच्या मागची सीट हवी असे. त्यात मीही आलो. ड्रायव्हरच्या मागची आडवी सहा जणांची सीट ड्रायव्हरकडं पाठ करून असे. तिथं बसणाऱ्यांना स्वाभाविकच पुढचं काही दिसायचं नाही. त्यामुळं अनेक मुलं या सीटवर उलट तोंड करून, ड्रायव्हरच्या मागची जाळी धरून समोरच्या काचेतून पुढला रस्ता पाहत असत. मीही तसंच करत असे. अधूनमधून ड्रायव्हरचंही निरीक्षण करणं सुरू असे. एवढी मोठी गाडी चालवणारा, घाटात ते स्टिअरिंग गरगर फिरवणारा, मनात येईल तेव्हा तो हॉर्न वाजवणारा ड्रायव्हर म्हणजे त्या सहा चाकांवरच्या फिरत्या देखाव्याचा अनभिषिक्त राजाच असे. पूर्वी दिवाळी किंवा सुट्टीच्या काळात एसट्यांना प्रचंड गर्दी असे. आरक्षण करून प्रवास करणं वगैरे गोष्टी गावाकडच्या लोकांच्या अंगवळणी पडल्या नव्हत्या. एसटी आली की घुसायचं आणि मिळेल त्या मार्गाने (अगदी ‘संकटकालीन खिडकी’तूनही) सीट पटकवायची हेच एकमेव ध्येय असायचं. अशा वेळी संपूर्ण गाडीत ज्या दोनच सीट्सना कुणी हात लावायचं नाही त्या म्हणजे ड्रायव्हर व कंडक्टरच्या सीट्स. त्यातही एखादा कनवाळू कंडक्टर असेल तर तो सगळ्या गाडीची तिकिटं फाडून होईपर्यंत आपल्या जागेवर एखाद्या वृद्ध व्यक्तीला बसायला देतही असे. पण ड्रायव्हरच्या सीटवर कोण बसणार? त्यामुळं सगळी गाडी खचाखच भरली, अगदी पुढच्या बॉनेटवर व शेजारच्या लाकडी पेटीवरही प्रवासी बसले, की ऐटीत येऊन स्टिअरिंगसमोरच्या सीटवर बसणारा, गळ्यातला गमछा सारखा करून घाम पुसणारा, कुणाचा तरी डबा शेजारी ठेवून घेणारा, ओळखीच्या एखाद्या पोराला उजव्या हाताला दारात अगदी कोंबून बसवणारा आणि निघण्यापूर्वी त्या खिडकीतून बाहेर पचकन पानाचा तोबरा थुंकणारा तो अफाट चक्रधर केवळ हेव्याचा विषय असे. त्या संपूर्ण गाडीवर सत्ता गाजवणारा तो सत्ताधीश वाटे. ड्रायव्हिंग सीटचा आणि सत्तेचा असा जवळचा संबंध आहे. ‘ड्रायव्हिंग सीटवर असणे’ वगैरे वाक्प्रचार त्यातूनच रूढ झाले असावेत.
एकदा तुम्हाला ड्रायव्हरची ही महती कळली, की मग ड्रायव्हर होणं हे मुख्य स्वप्न राहतं. कुठलं वाहन ते दुय्यम ठरतं. त्यामुळंच मग भविष्यात ट्रक, टॅक्सी, रेल्वे, आगबोट किंवा विमान (अगदी स्पेस शटलही) यापैकी कुठलंही वाहन चालवणाऱ्या ‘ड्रायव्हर’विषयी असूया, हेवा, त्याच वेळी आत्मीयता, जिव्हाळा अशा सगळ्याच भावना दाटून यायला लागल्या. पु. ल. देशपांडेंनी त्यांना ‘रेल्वे इंजिनचा ड्रायव्हर’ व्हायचं होतं, यावर एक लेख लिहिला आहे. माझ्या आयुष्यात रेल्वे तेवढी आली नाही. मात्र, विमानाच्या ‘ड्रायव्हर’विषयी, अर्थात वैमानिकाविषयी पुढं पुष्कळ आकर्षण निर्माण झालं. हे ‘सीरियस अफेअर’ होतं. अगदी आजही, मला मी वैमानिक व्हायला हवं होतं, असंच वाटतं. बाकी कुठल्याही क्षेत्रापेक्षा या क्षेत्रानं मला फार वेगानं आपल्याकडं खेचून घेतलं. आयुष्यात पहिला खराखुरा विमानप्रवास घडायला वयाची ३१ वर्षं उलटून जावी लागली. पुढं तो अगदी सातत्यानं नाही, तरी बऱ्यापैकी घडला. अगदी परदेश प्रवासही झाले. मात्र, पहिल्या विमान प्रवासाच्या वेळी टिकलेलं वैमानिक या जमातीविषयीचं आकर्षण किंवा प्रेम आजही कायम आहे. इथं एक गोष्ट सांगायला पाहिजे. मला उंचीची कधी भीती वाटली नाही. त्यामुळंच पहिल्यांदा विमान प्रवास करताना खरोखर कुठलीही भीती वाटली नाही; उलट ती उंचावरून दिसणारी दृश्यं छान एंजॉय केली. याउलट मला समुद्राची भीती वाटते. किंवा एकूणच पाण्याची! (पोहता येत नसल्यामुळं असेल...) पण पंचमहाभूतांपैकी एकाची तरी अशी भीती वाटतेच. तर, मुद्दा असा, की उंचीची भीती वाटत नसल्याने विमान चालवता यावं किंवा उंच आकाशात भराऱ्या माराव्यात, या स्वप्नाला बळच मिळत गेलं.
आजकालच्या मुलांमध्ये अनेक गोष्टी अत्यंत स्पष्ट असतात. आपल्याला पुढं काय व्हायचंय वगैरे हा त्यांचा फोकस अगदी लहान वयातच विकसित झालेला असतो. मी ज्या काळातून, शिक्षण व्यवस्थेतून आणि ग्रामीण भागातून आलो, तिथं दुर्दैवानं अशी स्वप्नं पाहण्याची मुभाच नव्हती. ‘हे आपल्यासाठी नाही,’ हे मनात अगदी आपोआप ठसून जात असे. त्यामुळं लहानपणापासून हे स्वप्न पाहण्याचा, त्याचा पाठपुरावा करण्याचा किंवा ते पूर्ण व्हावं म्हणून धडपड करण्याचा प्रश्नच आला नाही. अर्थात या सबबी नाहीत. तशी संधी मिळाली असती तरी केलं असतं का, हा प्रश्न आहेच. मात्र, आज अगदी तीव्रतेनं वाटतं, की आता सध्या मी ज्या पत्रकारितेच्या पेशात आहे (आणि तो मला आवडतो) त्यात नसतो, तर नक्कीच वैमानिक व्हायला आवडलं असतं. आता हे स्वप्न पूर्ण होणं अशक्यच. मग ते स्वप्न हीच आवड किंवा छंद म्हणून जोपासणं हा दुसरा पर्याय. मी आता तेच करतो. मी यूट्यूबवर किंवा इतर कुठल्याही समाजमाध्यमावर विमानांचे, वैमानिकांचे, विमानतळांचे व्हिडिओ पाहतो. सुदैवानं वैमानिकांच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक रोचक घटना कुणी ना कुणी तरी चित्रित करून ठेवली आहे. वैमानिकांचे अनेक ग्रुप आहेत. अनेक पेजेस आहेत. तिथं या संदर्भातील माहिती सातत्याने लिहिली जाते. जगातल्या विविध विमानतळांवर टेकऑफ आणि लँडिंगचे अक्षरश: हजारो व्हिडिओ आज आंतरजालात उपलब्ध आहेत. कितीही वेळा हे व्हिडिओ पाहिले तरी मन भरत नाही. जगभरात आज विमानतळांची संख्या मोठी आहे आणि ती दिवसेंदिवस वाढते आहे. आता केवळ अमेरिका, युरोप या खंडांतच नव्हे, तर विकसनशील देशांतही विमानतळांची उभारणी होत आहे. जगभरातील महानगरांत तर एकाहून अधिक विमानतळ आहेत. ही बलाढ्य विमानतळं म्हणजे एक स्वतंत्र विश्वच आहे. विमानाचे उड्डाण आणि लँडिंग ही मोठी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया अतिशय काटेकोरपणे, बिनचूक पार पाडावी लागते. त्यासाठी मोठी यंत्रणा काम करत असते. विमानतळावरचं लॉजिस्टिक्स आणि त्याचं व्यवस्थापन हाही एक अवाढव्य प्रकार असतो. एअर ट्रॅफिक कंट्रोल, ग्राउंड स्टाफ आणि प्रत्यक्ष विमानातील वैमानिक या तिघांच्या समन्वयातून एक उड्डाण यशस्वी होते. अशी अक्षरश: हजारो उड्डाणं दररोज होत असतात. यात अगदी सेकंदासेकंदाच्या हिशेबाने कामं चाललेली असतात. एक बारीकशी चूक अनेक प्रवाशांच्या जिवाशी खेळ ठरू शकते. (नुकत्याच अहमदाबादमध्ये झालेल्या ‘एअर इंडिया’च्या विमानाच्या दुर्दैवी अपघाताची आठवण या संदर्भात आल्याशिवाय राहत नाही.) एखादी गोष्ट जेवढी अधिक गुंतागुंतीची, तेवढी ती पार पाडण्यासाठी अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या माणसांची गरज लागते. अशा अनेक लोकांचा समूह एकत्र येऊन आपल्या बुद्धिसामर्थ्यावर व इतर विकसित कौशल्याच्या आधारावर विमानोड्डाणासारखं काम यशस्वी करून दाखवतो, तेव्हा मला त्या गोष्टीचं तीव्र आकर्षण वाटत राहतं.

विमानाचं उड्डाण ही मला आजही एक अद्भुत गोष्ट वाटते. आपणही पक्ष्यासारखं आकाशात तरंगत राहावं, हे माणसाचं कधीपासून स्वप्न होतं कोण जाणे. अमेरिकेच्या राइट बंधूंनी अखेर ते पूर्ण केलं, तो अगदी ताजा इतिहास. जेमतेम सव्वाशे-दीडशे वर्षांचा. मानवजातीच्या अस्तित्वाच्या कालखंडाशी तुलना केली तर ही प्रगती जेमतेम काही सेकंदांपूर्वी झालीय, असंच म्हणावं लागेल. प्रत्येक वेळी विमान आकाशाच्या अथांग पोकळीकडं झेप घेतं, तेव्हा माणसाच्या विजिगीषु वृत्तीला, त्याच्या प्रज्ञेला, त्याच्या जिद्दीला व अनंत ध्येयासक्तीला सलाम करावासा वाटतो. अगदी लहानपणी कधी आकाशातून उडणारं विमान पाहिलं, किंवा विमानाचा नुसता आवाज आला, तरी मी ते बघायला धावायचो. अगदी आजही, अनेकदा विमान प्रवास झाले असले तरीही, विमानाचा आवाज ऐकला की नजर आकाशाकडं जातेच. सुदैवानं पुण्यात मी जिथं राहतो, तिथून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) धावपट्टी अगदी जवळ आहे. एनडीएचं एक छोटं, दोन सीटर विमान जवळपास रोज सॉर्टीसाठी उड्डाण करतं. तेव्हा ते अगदी कमी उंचीवरून आमच्या घरावरून उडत जातं. ते मी न चुकता पाहतो. ते एवढ्या खालून जातं, की अनेकदा त्याच्या पंखांवर रोमन लिपीतून लिहिलेली NDA ही आद्याक्षरंही वाचता येतात. याच एनडीएच्या प्रांगणात वर्षातून दोन वेळा दीक्षान्त समारंभ होतात, तेव्हा सूर्यकिरण नामक पथकातील खास विमानांची प्रात्यक्षिकं होतात. ती बघताना डोळ्यांचं पारणं फिटतं. वैमानिकाच्या कॉकपिटमध्ये एकदा तरी बसून बघण्याचं माझं स्वप्न आहे. ते मात्र अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळंच तर मी कित्येकदा वैमानिकांच्या कॉकपिटमध्ये लावलेल्या कॅमेऱ्यांतून चित्रित झालेले कित्येक टेकऑफ आणि लँडिंग पाहत असतो. अनेकदा पुष्कळ प्रवासीही विमानाच्या खिडकीतून दिसणारी कित्येक सुंदर दृश्यं टिपतात. तशी दृश्यं तुम्हाला एरवी स्वप्नातही बघायला मिळणं कठीण. उत्तर ध्रुवाच्या प्रदेशावरून विमान जात असतानाचं दृश्य, हिमालयाच्या शुभ्र पर्वतरांगांवरून जाताना दिसणारं दृश्य, एका विमानातून शेजारून चाललेल्या दुसऱ्या विमानाचं दृश्य, विमानाच्या खिडकीतून दिसणारे अथांग महासागर, ढगांचे कधी गोजिरवाणे, तर कधी भयावह दिसणारे अवाढव्य आकार, सूर्योदय, सूर्यास्त, वाळवंट, मोठमोठ्या नद्या... अक्षरश: डोळ्यांचे पारणे फिडणारी अशी कित्येक दृश्यं अशा व्हिडिओंतून आपल्याला बघायला मिळतात. मला ते व्हिडिओ बघण्याचा अजिबात कंटाळा येत नाही. एकदा आपण तसे व्हिडिओ बघायला लागलो, की संबंधित समाजमाध्यमाद्वारे त्याच प्रकारचे आणखी व्हिडिओ आपल्यासमोर आणले जातात. त्यातून आणखी वेगळे व्हिडिओ, वेगळी दृश्यं, कित्येक चित्तथरारक दृश्यचौकटी बघायला मिळतात.
वैमानिक होण्याचं स्वप्न पूर्ण झालं नसलं तरी विमान प्रवासाचं स्वप्न मात्र पूर्ण झालं. मी माझ्या आयुष्यात पहिला विमान प्रवास केला तो वयाच्या ३१ व्या वर्षी. मुंबई ते बेंगळुरू असा तो प्रवास होता. विमानानं टेकऑफसाठी रनवेवर धावायला सुरुवात केली तेव्हा पोटात थोडा खड्डा पडल्यासारखं झालं. पण ते काही क्षणच. शरीराला एवढ्या प्रचंड वेगाची सवयच नव्हती. मात्र, पुढं मला काहीच त्रास झाला नाही व तो प्रवास अगदी एंजॉय केला. आभाळातून धरती कशी दिसते, ढगांचे पुंजके कसे विहरतात, लँडिंगच्या वेळी अगदी लहान लहान दिसणाऱ्या इमारती, घरं, शेतं हळूहळू मूळ रूपात कशी दिसू लागतात हे सगळं मी लहान मुलाच्या डोळ्यांनी अनुभवलं. लवकरच परदेश प्रवास करायचाही योग आला. आमच्या ऑफिसतर्फे थायलंड एका बिझनेस टूरवर जायला मिळालं. तो प्रवासही मोठा होता. समुद्रावरून होता. तो एक वेगळाच अनुभव होता. शिवाय एकट्याने केलेलाही तो पहिलाच परदेश प्रवास होता. आपण कधी विमानात बसू, परदेशात जाऊ असं मला लहानपणी कधीही वाटलं नव्हतं. मात्र, सुदैवानं आपल्या देशात अनेकांची ही (आता छोटी छोटी म्हणता येतील, अशी) स्वप्नं जशी पूर्ण झाली, तशी ती माझीही झाली. त्यानंतर एकदा सिंगापूरची सहल झाली. त्या वेळी ‘बोइंग ए ३८०’ या महाकाय, डबलडेकर जंबोजेटमध्ये बसण्याचंही स्वप्न पूर्ण झालं. मात्र माझं खरं स्वप्न होतं ते लंडनला जाण्याचं. पुलंचं ‘अपूर्वाई’ वाचल्यापासून मला लंडन शहराला भेट देण्याची ओढ लागली होती. अमेरिका किंवा इतर कुठल्याही देशापेक्षा मला लंडनला जावंसं वाटत होतं. का ते माहिती नाही. मात्र, हे स्वप्न पूर्ण होण्याची कुठलीही शक्यता दिसत नव्हती. अखेर काही वर्षांपूर्वी तशी संधी मिळाली व मी कुटुंबासह फक्त लंडन व पॅरिस या दोनच शहरांना भेट देणारी छोटेखानी (पण तरीही बरीच खर्चीक) सहल बुक केली. मात्र, हाय रे दुर्दैवा! त्या वेळी कोव्हिडची साथ सुरू झाल्याने ती ट्रिपच बारगळली. लंडनचं स्वप्न अधुरंच राहिलं. मात्र, माझी इच्छाशक्ती तीव्र होती. त्यामुळं अखेर २०२३ च्या ऑगस्टमध्ये लंडनवारी करता आली. प्रवासी कंपनीकडून टूर न घेता, आम्ही आमची आमची ही सहल केली. लंडनमध्ये माझा मेव्हणा राहत असल्यानं तिथं राहण्याचा प्रश्न नव्हता. उलट या आठ दिवसांत मनाजोगतं शहर भटकता आलं. खूप वर्षांपासूनचं एक स्वप्न पूर्ण झालं.
जगातील किमान दहा मोठी शहरं बघायची असंही एक स्वप्न आहे. त्यातली निदान दोन ते तीन बघून झाली आहेत. इतरही होतील, अशी आशा आहे. याशिवाय इतर लहान-मोठ्या स्वप्नांचीही ‘बकेट लिस्ट’ बरीच मोठी आहे. सगळीच स्वप्नं पूर्ण होत नाहीत हे माहिती आहे. मात्र, पूर्ण होणार नाहीत म्हणून ती स्वप्नात बघण्याचं सुख का गमवायचं, नाही का?

---

(पूर्वप्रसिद्धी : समदा दिवाळी अंक, २०२५. संपादक - मनस्विनी प्रभुणे-नायक)

---

9 Dec 2025

पाँडिचेरी डायरी - भाग ३

असीम शांततेकडे...
------------------------


ता. १ डिसेंबर २०२५. मु. पाँडिचेरी.

आजही सकाळपासून पाऊस होता. मग कालच्याप्रमाणेच आजही छत्र्या घेऊन चहा घेऊन आलो. आज आम्हाला ‘ऑरोव्हिल’ इथं जायचं होतं. हे पाँडिचेरीपासून साधारण १०-१२ किलोमीटरवर आणि तमिळनाडूत आहे. योगी अरविंदांच्या सहकारी, शिष्या मदर (मीरा अल्फासा) यांनी या ‘ऑरोव्हिल’ परिसराची स्थापना केली आहे. श्री अरविंदांच्या कर्मयोगातून ‘आतील शांततेकडे’ नेणाऱ्या या परिसराला भेट देण्याची अतीव उत्सुकता होती. इथल्या ‘मातृमंदिर’ या डोमविषयी आणि तिथल्या ध्यानधारणेविषयीही खूप ऐकलं होतं. तिथं प्रवेश करण्यासाठी आधी मेल पाठवून नंबर लावावा लागतो असंही समजलं होतं. त्यानुसार मी पुण्यात असतानाच मेलवरून बुकिंग करून, आजची वेळ घेतली होती. त्या मेलमध्ये सर्वांनी सकाळी ८.१५ वाजता मुख्य गेटवर जमावं, असं म्हटलं होतं. मात्र, आम्हाला आवरून बाहेर पडायला आणि कॅब मिळायला वेळ लागला. पाँडिचेरी ते तमिळनाडू आणि तिथून परत पाँडिचेरी असा दोन राज्यांचा प्रवास असल्यानं इकडचे कॅबवाले तिकडं येत नाहीत आणि तिकडच्या रिक्षा इकडं येत नाहीत, हे नंतर समजलं. आम्हाला भेटलेला कॅबवाला मी तिथंच तुमच्यासाठी थांबू का, असं का विचारत होता तेही नंतर कळलं. असो.
आम्ही साधारण सव्वानऊच्या सुमारास त्या गेटवर पोचलो. पार्किंगला कार आत आणली तर दीडशे रुपये वेगळे चार्जेस द्यावे लागले असते, म्हणून आम्ही आमची कॅब बाहेरच सोडली आणि आत चालत गेलो. आता पाऊस पूर्ण थांबला होता आणि त्या परिसरातलं वातावरण प्रसन्न होतं. आम्ही त्या पायवाटेवरून आत निघालो. एके ठिकाणी तळ्यासारखं बरंच पाणी साठलं होतं. त्यावर छोटा पूल होता. हे काही एका दिवसाच्या पावसानं साठलेलं पाणी वाटत नव्हतं. मातृमंदिर व तो परिसर याचं रूपांतर एका बेटात करण्यात येणार आहे. त्यासाठी संपूर्ण परिसरात गोलाकार चर खणून तलावनिर्मिती करण्यात येत आहे, असं नंतर समजलं. आम्ही आतील माहिती केंद्रावर पोचल्यावर एका  मिनीबसमध्ये काही लोक चढत असल्याचं दिसलं. तिथल्या माणसानं माझं बुकिंग आहे, म्हटल्यावर तातडीनं त्या बसकडं एक मॅडम उभ्या होत्या, त्यांच्याकडं पाठवलं. त्यांनी आणखी एका प्रौढ गोऱ्या (परदेशी) इसमाकडं पाठवलं. तो तिथला मुख्य व्यवस्थापक असावा. त्यानं माझ्या मेलमधला क्रमांक पाहून बॅच कन्फर्म केली. ‘तुला उशीर झाला आहे आणि सुरुवातीचा व्हिडिओ बघणं आवश्यक असतं, तेही तुझं बुडालं आहे,’ असं तो म्हणाला. पण तो दयाळू होता. त्यानं मला नंतर व्हिडिओ बघण्याच्या अटीवर बसमध्ये जाऊ दिलं. तुझ्यासोबत कुणी आहे का, असंही त्यानं विचारून घेतलं. मग धनश्री व नीललाही त्यानं माझ्यासोबत येण्याची परवानगी दिली. (त्यांचं वेगळं बुकिंग करणं गरजेचं होतं. ते आम्ही केलं नव्हतं. किंबहुना प्रयत्न करूनही फक्त मलाच कन्फर्मेशन मिळालं होतं. मात्र, त्या दिवशी पावसामुळं म्हणा, किंवा अन्य काही कारणानं म्हणा, लोक कमी आले असावेत, म्हणून आम्हा तिघांनाही त्यानं बसमध्ये बसू दिलं.) असो. 
त्या बसमधून साधारण दीड-दोन किलोमीटर आत कच्च्या रस्त्यानं गेल्यावर ‘मातृमंदिर’च्या त्या प्रवेशद्वारापाशी आम्ही पोचलो. पाऊस पडून गेला असल्यानं सगळीकडं चिखल झाला होता. तिथं सगळे जमा झाल्यानंतर आमच्या आधीची बॅच आत जायची वाट पाहत थांबलो. त्यानंतर आमचा नंबर लागला. आमच्या ग्रुपमध्ये ३२-३३ लोक होते. त्यात अर्थात काही मराठी लोकही होते. इथं आता आमच्या बॅग आणि मोबाइल स्विच ऑफ करून जमा करायचे होते. ते जमा केल्यावर आम्ही त्या परिसराच्या मुख्य दारातून आत प्रवेश केला. तिथंच एका झाडाखाली ललित नावाच्या व्यवस्थापकानं आम्हाला पुन्हा सगळी माहिती दिली. सगळे नियम समजावून सांगितले. आवाज होणारी कुठलीही गोष्ट (पैंजण इ.) इथंच काढून ठेवा असं सांगितलं. स्मार्ट वॉचमध्ये कॅमेरा असेल तर तोही काढून ठेवा असं बजावण्यात आलं. त्यानंतर ललितभाऊंनी आम्हाला इथल्या स्थानिक स्वयंसेवकाच्या हवाली केलं. तो आम्हाला घेऊन चालत निघाला. समोरच ‘मातृमंदिरा’चा तो भव्य डोम दिसत होता. ही वास्तुरचना अतिशय आगळीवेगळी आहे. बाहेरून सोनेरी रंग असलेली आणि कमळाच्या पाकळ्यांचा आकार असलेली ती वास्तू एकदम वेगळीच भासत होती. त्या वास्तूशेजारीच एक मोठं वडाचं झाड आहे. ते झाड म्हणजे या सर्व परिसराचा केंद्रबिंदू आहे, असं त्या स्वयंसेवकानं आम्हाला सांगितलं. त्यानंतर त्यानं आम्हाला तिथल्या ॲम्फी थिएटरमध्ये नेलं. या परिसराचा विकास सुरू झाला, तेव्हा पहिल्यांदा इथं विविध देशांतील माती आणून मोठा सोहळा करण्यात आला होता. तो सगळा परिसरच अतीव शांततेनं भारलेला होता. आमच्या ग्रुपमधलेही सगळे लोक अगदी शांतपणे हे सगळं बघत होते. त्या वातावरणाचा परिणाम म्हणून आपोआपच मौन बाळगलं जात होतं किंवा अगदी हळू आवाजात बोललं जात होतं. आता आम्हाला हळूहळू त्या मुख्य डोमकडं नेण्यात आलं. त्या डोममध्ये शिरल्यावर त्याची भव्यता आणखीनच जाणवली. किमान पाच ते सहा मजल्यांएवढा तो उंच असावा. आम्ही शांततेत, शिस्तीत एक रांग करून आत शिरलो. कमळाच्या पाकळ्यांसारखी सभोवती १२ दालने होती, त्यांच्यामधून आत रस्ता होता. तिथं चपला, बूट काढून ठेवायचे होते. आत सगळीकडं कारपेट टाकलेलं होतं. त्या डोमच्या मधोमध खुली जागा होती. तिथं कमळाच्या आकाराच्या जागेत पाणी खळाळत आत जात होतं. तिथं आम्ही गोल करून बसलो. दहा मिनिटं शांत बसल्यावर बाकी कुठलेही आवाज येणं बंद झालं. केवळ त्या पाण्याचा खळाळता आवाज! थोड्या वेळानं तिथल्या स्वयंसेवक महिलांनी हलकेच टाळी वाजवून आम्हाला उठवलं. नंतर आता मुख्य डोममध्ये जायचं होतं. आत गेल्यावर सर्वांना पांढरे मोजे घालायला दिले. पँट असेल तर तीही मोज्यांच्या आत खोचायची होती. तिथून आम्ही पहिल्या फ्लायरनं वर आलो. तिथून वर जायला वर्तुळाकार, सर्पिलाकार रॅम्प होता. इथं त्यांच्यातली एक स्वयंसेविका आम्हाला घेऊन वर निघाली. ती एका विशिष्ट पद्धतीनं पावलं टाकत हळूहळू वर निघाली होती. आम्ही तिच्या मागे चालत होतो. आमच्यातल्या एका प्रौढ माणसाला काय घाई झाली होती, कुणास ठाऊक. तो तिला ओलांडून भरभर वर गेला. तिथं आडवी दोरी लावून रस्ता बंद केला होता. मग ही स्वयंसेविका अतीव हळू गतीनं तिथं पोचली. शेवटच्या टप्प्यात माझ्या मागचा माणूस मला हळूच पुढं सटकण्यासाठी खुणावत असल्यानं मीही तिला ओलांडून पुढं गेलो. मात्र, नंतर वाटलं, की आपलं हे चुकलं. कारण त्या बाईनं असा काही लूक दिला, की मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. कदाचित ध्यान मंदिरात जाण्याआधी ही आपल्या संयमाची परीक्षा असावी. मी त्यात नापास झालो होतो. मला त्या मागच्या माणसाचा भयंकर राग आला. पण आता चूक होऊन गेली होती.
वर एका गोऱ्या प्रौढानं ती दोरी बाजूला केली आणि मग आम्ही आत शिरलो. आत त्या विशाल डोमच्या मधोमध एक क्रिस्टल बॉल होता. त्यातून प्रकाश येत होता. अगदी काही सिनेमांत दाखवतात तसलं गूढ वातावरण होतं. तिथं मोठमोठे खांब होते. त्यांमधून पांढरीशुभ्र चादर व उशीच्या आकाराचं जाजम अंथरलं होतं. त्यावर एकेकानं बसून घेतलं. इथं साधारण पंधरा मिनिटं ध्यानधारणा करता येणार होती. मी डोळे मिटले. एका विलक्षण, असीम, अलौकिक शांततेचा अनुभव मी घेत होतो. किती काळ गेला, कळलं नाही. एक माणूस मोठ्यानं खोकला. सर्वांचीच तंद्री भंगली. खरं तर या सूचना आधी दिल्या होत्या. मात्र, आपल्याकडं ते नियम मोडणारे, किंवा त्यांना गांभीर्यानं न घेणारे लोक असतातच. तो माणूस दुसऱ्यांदा खोकल्यावर त्या गोऱ्यानं त्याला हळूच दंडाला धरून बाहेर नेलं. आम्ही पुन्हा एकदा ध्यानावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. आता दुसरं कुणी तरी खोकलं. मग त्या गोऱ्यानं त्या व्यक्तीलाही बाहेर नेलं. त्यानंतर मात्र बरीच शांतता लाभली. आपल्या आयुष्यात आपण किती ‘नॉइज’ला, गोंगाटाला तोंड देतो हे कळून आलं. हा सगळा खटाटोप ‘इनर पीस’साठी, अर्थात आतल्या शांततेसाठी सुरू होता. बाहेर कितीही शांतता असली, तरी मनात खळबळ सुरू असेल तर आपलं चित्त एकाग्र होऊ शकत नाही. त्यामुळं मन शांत ठेवणं फार गरजेचं असतं. ते आपल्या एकूण आरोग्यासाठीही महत्त्वाचं असतं. हे सगळं आपल्याला कळत असतं. पण वळत नसतं... असो. त्या शांततेतून बाहेर येण्यासाठी दोनदा लाइट ब्लिंक करण्यात आले. मग आम्ही शांतपणे डोळे उघडले. इशाऱ्यानेच आम्हाला बाहेर जायला सांगण्यात आलं. आम्ही अजिबात आवाज न करता, बाहेर आलो. खालच्या मजल्यावर आलो. ते मोजे काढून ठेवले. तिथून खाली उतरून एकदम बाहेर आलो. तो परिसरही तसा शांतच होता. केवळ पक्ष्यांचे आवाज येत होते. आता आम्ही त्या वडाच्या प्रचंड झाडाखाली टाकलेल्या बाकांखाली जाऊन बसलो. सहज मोजलं तर साधारण २३ खोडं जमिनीत उभी होती, एवढं ते झाड भव्य होतं. खरं तर तिथून निघायला नको वाटत होतं. आज पावसानं कृपा केली होती. थोडा वेळ तर चक्क ऊनही पडलं होतं. आमचं नशीब जोरावर होतं, म्हणून इथं येता आलं. एरवी खूप पाऊस असला, की हे ‘मातृमंदिर’ बंद असतं, असं समजलं. 
आता हळूहळू बाहेर पडायची वेळ झाली होती. सगळे त्या एंट्री गेटपाशी जमलो. आपापल्या बॅगा आणि मोबाइल ताब्यात घेतले. साधारण तास-दीड तास आम्ही मोबाइलपासून दूर होतो. मोबाइल सुरू केल्यावर कळलं, की या काळात फार काही घडलेलं नाही. आपल्यावाचून कुणाचंही काहीही अडलेलं नाही. आपण या काळात जे मिळवलं, ते किती तरी अधिक मौल्यवान होतं! असो.
इथून बसनं पुन्हा मुख्य दारापाशी आलो. इथं कॅफे, कँटीन असं सगळं होतं. आम्ही सकाळी नाश्ता न करताच निघालो होतो. आता कडकडून भूक लागली होती. मग तिथं व्यवस्थित खाल्लं. नंतर ते माहिती केंद्र फिरून पाहिलं. तो सकाळी चुकलेला व्हिडिओही पाहिला. त्यात या ‘मातृमंदिरा’ची संकल्पना ते आजपर्यंतचा प्रवास दाखवला होता. एवढं सगळं झाल्यावर आम्ही परत पाँडिचेरीला जायला निघालो. कॅब बुक केली तर त्यानं ॲपवर दाखवलेल्या पैशांपेक्षा दुप्पट पैसे मागितले. आम्ही येताना ३०० रुपयांत आलो होतो. हा आता ६०० रुपये मागत होता. कारण तेच - दुसऱ्या राज्यात जायचंय. तिथून परत यायला काही मिळत नाही वगैरे. रिक्षावाल्यांनीही तेच ऐकवलं. अखेर एकाला ४५० रुपयांत पटवलं. त्यानं निघाल्याबरोबर काही मिनिटांत उजव्या बाजूला एका कच्च्या वाटणाऱ्या रस्त्यावर गाडी घातली. जरा टरकायला झालं. पण मी लोकेशन ऑन ठेवून मॅपवर रस्ता पाहत होतो. अनेकदा हे गावाकडचे रिक्षावाले शॉर्टकट मारत इंधन वाचवत जातात. हाही तसाच होता. कुठल्या कुठल्या इंडस्ट्रियल एरियातून, गल्ली-बोळांतून (बहुतेक पोलिसांना चुकवत) त्यानं रिक्षा पाँडिचेरीत आणली. आम्हाला हॉटेलवर पोचायला दीड वाजला होता. नंतर आम्ही हॉटेलवर आरामच केला. 

आता आजच्या ‘टूर गाइड’मध्ये एका पॅराडाइज बीच नावाच्या ठिकाणाला भेट दर्शविली होती. तिथं वॉटर स्पोर्ट वगैरे होते. त्या आयलंडवर बोटीनं प्रवास करून जायचं होतं. वादळी वातावरणात तिकडं जायला नको वाटलं. मग तो विचारच रद्द करून टाकला. आम्ही संध्याकाळी पुन्हा एकदा प्रोमोनेडला चालत गेलो. त्याआधी भारती पार्कमध्ये जाऊ, असं ठरवलं. ते पार्क सुंदर आहेच. तिथं मधोमध ते ‘अयी मेमोरियल’ दिसलं. तिथं माहिती फक्त तमिळ व फ्रेंचमधूनच होती. मग ‘गुगल’वर माहिती वाचली. ‘अयी’ची दंतकथा समजली. ही त्या काळातली एक नर्तकी होती. तिचा एक मोठा महाल होता. राजाचे लोक की खुद्द राजाच तिथून चालला असताना, त्यांना हे कुठलं तरी भव्य मंदिर वाटलं. त्यांनी आत जाऊन नमस्कार केला आणि मग त्यांना कळलं, की हे नर्तकीचं घर आहे. या अपमानानं क्रुद्ध झालेल्या राजानं तो महाल जमीनदोस्त करण्याची आज्ञा सोडली. त्यावर ‘अयी’नं राजाकडं धाव घेतली आणि सांगितलं, की इथं मी एक विहीर खोदून तिचं पाणी सर्वांना (स्पृश्यास्पृश्यता न बाळगता) देईन. त्या गोष्टीला राजानं परवानगी दिली. त्यानंतर ‘अयी’ ही पाणी देणारी स्त्री म्हणून ओळखली जाऊ लागली आणि नंतर तर तिला देवस्वरूप आलं. दुसरी दंतकथा अशी, की कुणी मौलवी वा पीर तिच्या घरावरून चालले होते. त्यांना तहान लागली म्हणून त्यांनी ‘अयी’कडं पाणी मागितलं. मात्र, त्या गावातील ब्राह्मण पुजाऱ्यांनी तिला मौलवीला पाणी देण्यास मनाई केली. त्यानंतर ‘अयी’नं स्वत:चा महाल उद्ध्वस्त करून सर्वांना पाणी देता येईल, अशी विहीर खोदली. वगैरे वगैरे. (मला स्वत:ला पहिली दंतकथा जास्त विश्वासार्ह वाटली. तमिळनाडूतल्या पेरियार प्रणीत ब्राह्मणेतर चळवळीचा इतिहास पाहिला, तर त्या काळात ही दुसरी ‘राजकीय’ दंतकथा जन्माला आली असण्याची शक्यता अधिक!)

‘भारती पार्क’च्या मधोमध जे स्मारक आहे, ते तिसऱ्या की चौथ्या नेपोलियननं बांधलं आहे. ते ‘अयी’च्याच स्मरणार्थ आहे. शिवाय त्या पार्कमध्ये एक कारंजं होतं. तिथंही ‘अयी’चा पाणी देतानाचा पुतळा आहे. तिच्या घागरीतून सतत पाणी पडत असतं. या पार्कमध्ये अतिशय शांत वाटलं. एकूणच पुण्यााबाहेर कुठंही गेलं, की ‘कमी गर्दी’ हे एवढं जाणवतं ना! आपल्याकडं केवढी प्रचंड गर्दी झाली आहे, हे सतत डाचत राहतं. असो.
पार्कमधून पुन्हा प्रोमोनेडवर गेलो. कालच्या तुलनेत आज समुद्र शांत होता आणि पाऊसही अजिबात नव्हता. सर्व दिवे लागले होते. वातावरण फारच सुंदर होतं. समोरच्या जुन्या कस्टम हाऊसवरचा तिरंगा सहा वाजता खाली उतरवण्याचा सोहळा झाला. बिगुल वाजलं, तेव्हा सगळे तिकडं धावले. अगदी समारंभपूर्वक तो ध्वज खाली घेण्यात आला. गांधीजींचा पुतळा व तो परिसर आता छान झगमगत होता. पर्यटकांची थोडी गर्दी होती. तिथंच अगदी समुद्रावर ‘ल कॅफे’ नावाचं रेस्टॉरंट आहे. आम्हाला भूक लागली होतीच. मग तिथं जाऊन, समुद्राची गाज ऐकत पिझ्झा खाल्ला आणि नंतर मस्त लेमोनेड प्यायलं. इथंही छान लायटिंग होतं. चांगले फोटो काढता आले. सात-साडेसातपर्यंत तिथंच टाइमपास केला. मग चालत निघालो. इथं समोरच एक तुळशीबागेसारखं मार्केट होतं. तिथं टाइमपास केला. थोडी खरेदी केली. आज ‘सुरगुरू’त जायचं नव्हतं. कार्तिक नावाचं एक रेस्टॉरंट सतत ‘सर्च’मध्ये येत होतं. तिथं जाऊन बघू, असं ठरवलं. सुदैवानं ते चांगलं, मोठं रेस्टॉरंट होतं. अनेक लोक तिथं जेवत होते. इथंही ऑर्डर घ्यायला महिलाच होत्या. मग डोसा, राइस असं सगळं रीतसर जेवलो. निवांत चालत चालत हॉटेलवर गेलो. आज एवढ्या असीम शांततेचा अनुभव घेतला होता, की त्यामुळं झोपही पटकन व शांत लागली.


---

पाँडिचेरी/चेन्नई/पुणे. ता. २ डिसेंबर २०२५. 

आज परतीचा दिवस. सकाळी नऊ वाजताच टॅक्सी बोलावली होती, जाताना जो टॅक्सीवाला आला होता, तोच आता येणार होता. तोही थेट चेन्नईहून. तो पहाटे चार वाजता चेन्नईहून निघून आमच्या हॉटेलला नऊ वाजता येऊन थांबला होता. आम्ही सकाळी जवळच्या ‘सुरगुरू’त जाऊन (हे नूतनीकरणासाठी बंद होतं. कालच सुरू झाल्याचं संध्याकाळी समजलं होतं...) नाश्ता केला. नंतर चेक-आउट केलं. बरोबर साडेनऊला आमचा प्रवास चेन्नईच्या दिशेनं सुरू झाला. जयशंकरला झोप येत होती, हे दिसत होतं. मी त्याला गाडी थांबवून चहा घ्यायला सांगितलं. मग तो थांबला. आता आम्ही ‘कचरा रोड’नं न येता, थुथीकोडी (तुतीकोरीन)-चेन्नई हायवेनं टिंडिवनम, चेंगलपट्टू मार्गे परत निघालो होतो. जयशंकरला घरी जायची घाई झाली होती. त्यामुळं त्यानं सुसाट गाडी सोडली. हा हायवेही उत्तम होता. त्यामुळं त्यानं आम्हाला बारा वाजता चेन्नई एअरपोर्टला सोडलंही. आमचं फ्लाइट ३.४० ला होतं. मग त्याला म्हटलं, इथं बाहेर जो फूड मॉल आहे तिथं सोड. मग तिथं जाऊन खाणं-पिणं असा टाइमपास करत बसलो. बरोबर दीड वाजता त्या बॅटरी-ऑपरेटेड गाडीनं टर्मिनल - १ ला आलो. इथं एस्कलेटर, लिफ्ट असं करत सगळं सामान घेऊन दुसऱ्या मजल्यावर आलो. सिक्युरिटी वगैरे पार पाडून गेटवर येऊन बसलो तरी दोनच वाजले होते. मग पुन्हा टाइमपास. आमचं ‘इंडिगो’चं फ्लाइट थोडं उशिरानं आलं. बराच वेळ ‘सिक्युरिटी’ एवढंच दाखवत होते. वेळही ३.४० ऐवजी ४.०० अशी केली होती. अखेर सगळं मार्गी लागलं. बोर्डिंगही साडेतीन-पावणेचारला सुरू झालं. आमचं विमान साधारण तासभर उशिरा, म्हणजे पावणेपाचला उडालं. ते बरोबर सव्वासहा वाजता पुण्यात लँड झालं. (दुसऱ्या दिवशीपासून ‘इंडिगो’चा जो महागोंधळ सुरू झाला, ते बघितल्यावर मंगळवारी तसे वेळेत पुण्यात पोचणारे आम्ही फारच नशीबवान ठरलो, म्हणायचे.) कॅब करून आठ वाजेपर्यंत घरी पोचलो. पुण्यात लँड होताना हवेतला प्रदूषणाचा जाडसर थर अगदी जाणवला. खाली उतरल्यावर घरी येईपर्यंत रस्त्यावरचा कोलाहल, गोंधळ ऐकून आपण किती शांततेत चार दिवस राहत होतो, हे प्रकर्षानं जाणवलं. असो.
एकूण चार दिवसांची ही छोटेखानी ट्रिप फारच मस्त झाली. ‘मातृमंदिर’मधील ध्यानधारणेचे क्षण हे या ट्रिपमधले सर्वोच्च आनंददायी क्षण म्हणता येतील. 
गेल्या तीन-चार वर्षांत आमच्या दक्षिणेकडंच तीन-चार ट्रिप झाल्या. आता उत्तरायण सुरू करायला हवं... बघू या, कधी योग येतो ते!


(समाप्त)


दुबई ट्रिपविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

------------------------