9 Apr 2026

वाराणसी-अयोध्या यात्रा - भाग १

काशीस जावे, नित्य वदावे...
---------------------------------


सर्व भारतीयांप्रमाणे आपणही कधी तरी काशीला (म्हणजेच वाराणसी किंवा बनारसला) जावे, गंगा पाहावी, विश्वनाथाचे दर्शन करावे अशी माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. मात्र, देवस्थानांबाबत माझा अनुभव असा आहे, की तुमचा योग यावा लागतो. आपण घोकून काहीही होत नाही. त्यामुळं मी शांतपणे या योगाची वाट पाहत राहिलो. पत्रकारितेत येऊन आता मला जवळपास तीन दशकं झाली. भारताच्या राजकारणात उत्तर प्रदेशचं महत्त्व वेगळं सांगायला नको. गंगा-यमुनेच्या खोऱ्यांत पसरलेला हा विशाल भूभाग म्हणजे खरा भारत, असं अनेक ठिकाणी वाचलं होतं. अनुभवलंही होतं. ‘यूपी नहीं देखा तो क्या इंडिया देखा?’ अशी (जरा आढ्यतेखोर वाटणारी) जाहिरात ‘यूपी टुरिझम’ करतं. अर्थात त्यात तथ्य आहेच. भारताबाहेरच्या अनेक लोकांना भारत म्हणजे ‘ताजमहाल, काशीचे घाट, गंगा, त्रिवेणी संगम’ हेच वाटतं. त्यात महाराष्ट्रासह संपूर्ण दक्षिण भारत अनेकदा नसतोच. अर्थात ‘गंगा’ म्हणजे भारताची ‌ठ‌ळक ओळख. शिवाय काशी-रामेश्वर या नात्याने दक्षिण भारतीय मंडळीही काशीस येतच असतात. महाराष्ट्राचं आणि काशीचं नातंही फार जुनं. तिथले अनेक घाट अहिल्याबाईंनी, शिंद्यांनी, भोसल्यांनी बांधले. तिथले अनेक धर्मपंडित इकडून तिकडे गेले. तिकडूनही इकडं आले. आपली मुळं, आपला डीएनए एकच आहे, हे वेगळं सांगायचीही गरज नाही. त्यामुळं गंगा पाहणं, दोन की तीन हजार की किती तरी जास्त वर्षांहून अधिक काळ भारतीय संस्कृतीचे साक्षीदार असलेले तिथले ते घाट पाहणं, तब्बल साडेतीन हजार मंदिरं असलेली सर्वांत प्राचीन नगरी वाराणसी तिथल्या त्या तितक्याच प्राचीन गल्ली-बोळांतून फिरून प्रत्यक्ष अनुभवणं हे सगळं ‘बकेट लिस्ट’मध्ये होतं. ‘काशीस जावे नित्य वदावे’ असं आपण म्हणतो. तसं मी जाहीरपणे नाही, पण मनातल्या मनात कितीदा तरी घोकत होतो. आग्रा व ताजमहाल पूर्वीच बघून झाला. त्या अर्थानं उत्तर प्रदेशाला पाय लागले होते. मात्र, वाराणसी, प्रयागराज, लखनौ, कानपूर, अयोध्या, गोरखपूर ही उत्तर प्रदेशातली ‘कोअर’ शहरं पाहिल्याशिवाय आपण खरा भारत पाहिला, असं मला तरी काही वाटत नव्हतं. पत्रकारितेत असताना निदान निवडणुका कव्हर करण्यासाठी तरी या राज्यात जावं, असं अनेकदा वाटलं. मात्र, तोही योग काही आला नाही. अखेर या इच्छेनं तीव्र उचल खाल्ली ती दोन वर्षांपूर्वी २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत ‘रामलल्ला’ विराजमान झाले, तेव्हापासून! अयोध्या ही तर गेल्या तीन दशकांतल्या सर्वांत धगधगत्या मुद्द्याची केंद्रबिंदू नगरी होती. मी तो सर्व काळ वृत्तपत्राच्या कार्यालयांतून पाहिला होता. बातम्या केल्या होत्या. अखेर करोडो भारतीयांच्या स्वप्नांची पूर्तता २२ जानेवारी २०२४ रोजी झाली होती आणि बहुतांश भारतीयांत असतं तसं माझ्यातही लपून असलेलं एक ‘भाबडं हिंदू मन’ उचंबळून आलं. रामाला त्रेतायुगात १४ वर्षांचा वनवास झाला; मात्र कलियुगात तो पाचशेहून अधिक वर्षांचा झाला आणि अखेर त्याला त्याचं न्याय्य ‘घर’ मंदिराच्या रूपानं मिळालं, ही बहुतांश भारतीयांप्रमाणे माझीही भावना होती व आहे. पत्रकार म्हणून अयोध्या पाहण्याची उत्सुकता होतीच; पण त्याहून अधिक ओढ माझ्यातल्या ‘भाबडं हिंदू मन असलेल्या भाविका’ला लागली होती. सुदैवानं मंदिरात रामलल्ला विराजमान झाल्या झाल्या पुढच्याच महिन्यात माझ्या आई-वडिलांना अयोध्येला जाण्याची संधी मिळाली. त्यामुळं आता मी जायला अगदी सज्ज झालो होतो. अर्थात अयोध्येत एवढी कामं सुरू होती, की ती संपूर्ण झाल्यावरच आपण जावं, असंही एक व्यावहारिक मन सांगत होतं. अखेर (वयाची पन्नाशी उलटून गेल्यावर) फेब्रुवारीत आमचं अयोध्या व वाराणसीला जायचं ठरलं. आमचे नेहमीचे साथीदार - माझा आत्येभाऊ साईनाथ व त्याची पत्नी वृषाली - आणि आम्ही दोघं - मी व धनश्री - असं चौघांनी जायचं ठरलं. आमची मुलं येणारी नव्हती. त्यांच्या परीक्षा असणार होत्या. परीक्षा झाल्यावर त्या दोघांना (हवं तिथं!) आम्ही ट्रिपला जाऊ देऊ, या अटीवर मुलांनी आम्हाला सोडलं. अर्थात आता आमची ट्रिप तशी सुटसुटीत झाली. मग फेब्रुवारीच्या मध्यालाच आधी विमानाचं बुकिंग करून टाकलं. (तेव्हा आखाती युद्धाचं काहीही वारं नव्हतं.) आता पुण्याहून वाराणसीला ‘इंडिगो’ची थेट फ्लाइट आहे आणि ती फार सोयीची आहे. दोन तासांत थेट वाराणसीला पोचता येतं. तीन ते सात  एप्रिल अशी पाच दिवस ट्रिप ठरली. आधी अयोध्या व वाराणसीच्या जोडीला प्रयागराजही ठरवत होतो; पण ते वेळापत्रकात बसेना. मग फक्त अयोध्या व वाराणसी करू या, असं ठरवलं.
पंधरा दिवसांपूर्वी साईनाथनं दोन्ही ठिकाणची हॉटेल्स बुक केली. वाराणसीवरून अयोध्येला जाण्यासाठी खासगी कॅब करण्यापेक्षा ‘वंदे भारत’ सोयीची आहे, असं संशोधनाअंती समजलं. मग मी त्या ट्रेनचं जातानाचं व येतानाचं बुकिंग करून टाकलं. युद्ध सुरू झाल्यानंतर आपल्या इथल्या विमान प्रवासावर काय परिणाम होतोय, अशी जरा धाकधूक होती. तसं थोडं झालंच. आमच्या जातानाच्या फ्लाइटची वेळ बदलून अलीकडं आली. आधी रात्री ११.४० ला निघणारी ही फ्लाइट दुपारी पावणेपाचला झाली. अर्थात हे सोयीचं झालं. मध्यरात्री वाराणसीला पोचण्यापेक्षा आता आम्ही संध्याकाळ पावणेसातला पोचणार होतो हे बरंच झालं. ठरल्याप्रमाणे तीन तारखेला दुपारी आम्ही निघालो. फ्लाइट वेळेत होती व वेळ‌ेत पोचली. मी डाव्या बाजूला खिडकीशी बसलो होतो. वाराणसीच्या अलीकडं  लँडिंगच्या पंधरा मिनिटं आधी एकदम गंगा दिसली. काही हजार फूट उंचीवरूनही आणि काहीशा धुरकट वातावरणातूनही गंगेचं ते विशाल पात्र पाहून मन एकदम रोमांचित झालं. ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ अशी उन्मनी अवस्था झाली. मी तरीही पटकन मोबाइल काढून त्या भव्य पात्राचं चित्रीकरण केलं. थोड्याच वेळात अगदी वाराणसी शहर व गंगेचे ते घाटही दिसू लागले. विमान वळताना पुन्हा गंगेचं दर्शन घडलं. फारच छान वाटलं. पुढच्या पाच मिनिटांत आमच्या विमानानं वाराणसीच्या विमानतळावर ‘टच्ड डाउन’ केलं.
मी ‘मेकमायट्रिप’वरून आदल्या दिवशी कॅब बुक केली होती. तिथं ‘विवेक दीक्षित’ असं नाव आल्यावर मी हसून म्हटलं, की ड्रायव्हरचं नाव बघा. वेलकम टु यूपी! अर्थात यूपीत पोचल्यावर कळलं, की हे त्या मालकाचं नाव आहे. प्रत्यक्ष ड्रायव्हर कुणी दुसराच होता. त्यातही आधी एका ड्रायव्हरचा फोन आला. त्यानं आमच्याकडं चार बॅगा आहेत म्हटल्यावर ट्रिप कॅन्सल केली. मग बहुतेक दीक्षितजींनी (जे अर्थात मालक होते) हा दुसरा पाठवला होता म्हणे. मला आधी त्याचं नाव शर्मा वाटलं. पण तो ‘राजेश विश्वकर्मा’ निघाला. हा ड्रायव्हर हुशार होता व बहुतेक ड्रायव्हर असतात तसा बडबड्या होता. आमच्या वृषालीला नेहमी चहा हवा असतो. मलाही हवा असतो म्हणा. मग विमानतळावर ‘काशी का स्वाद’ नावाचं एक छोटेखानी रेस्टॉरंट दिसलं. तिथं गेल्यावर चहा १०० रुपये म्हटल्यावर आम्ही बाहेरच आलो. ड्रायव्हर राजेशला आमची फजिती सांगितल्यावर तो हसला आणि रस्त्यात थांबून आपण चहा घेऊ म्हणाला. वाराणसीचा हा ‘लाल बहादुर शास्त्री अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा’ तसा पुण्याच्या विमानतळापेक्षाही लहान होता. मात्र, टुमदार होता. तिथं प्रांगणातच शास्त्रीजींचा ब्राँझचा भव्य पुतळा  आणि तिरंगा आहे. आम्ही त्याच पुतळ्याच्या खाणाखुणा सांगत कॅबपर्यंत पोचलो होतो. हा विमानतळ बाबतपूर नावाच्या गावात आहे. तो वाराणसीपासून जवळपास ३० किलोमीटर दूर आहे. त्यामुळं मधे थांबून चहा घेणं आवश्यकच होतं. मग विमानतळाबाहेर पडल्या पडल्या लगेच डाव्या हाताला काही टपरीवजा छोटी हॉटेलं लागली, तिथं आमच्या ड्रायव्हरनं कार थांबविली. संध्याकाळचे सात-सव्वासात झाले होते. मात्र, या दिवसांत आपल्याकडं जसा उजेड असतो, तसं तिकडं नसतो. वाराणसी पुण्यापासून ईशान्येला जवळपास १३०० किलोमीटवर आहे. त्यामुळं त्या संधीप्रकाशापेक्षाही जरा अंधारच पडलेल्या वेळेला आम्ही ‘कुल्हड’मधून झकास चहा घेतला. राजेशभाईला पण दिला. मग त्यानं तिथून आमची कॅब भरधाव शहराच्या दिशेनं सोडली. थोड्याच वेळात आम्हाला एक फ्लायओव्हर लागला. उजवीकडं लखनौ (२८१ किलोमीटर) व डावीकडं वाराणसी (२२ किलोमीटर) होतं. तो फ्लायओव्हर बराच मोठा होता. वाराणसीत मी यापूर्वी कधी आलो नव्हतो. त्यामुळ‌ं आधी इथं कसा रस्ता होता, हे मला ठाऊक नव्हतं. मात्र, ड्रायव्हरच्या मते ही सगळी सुधारणा आत्ताची, गेल्या दहा वर्षांतली आहे. त्या भल्या मोठ्या फ्लायओव्हरवरून दीर्घकाळ प्रवास केल्यावर आम्ही वाराणसी शहरात प्रवेश केला. तिथंही नवं शहर व जुनं शहर असे दोन भाग आहेतच. आमचं ‘आनंद काशी’ हे हॉटेल काशी विश्वनाथ मंदिरापासून जेमतेम दोन किलोमीटवर, अर्थात जुन्या शहराच्या मध्यभागी होतं. त्यामुळं कॅब जसजशी जुन्या शहराकडं जाऊ लागली, तसतसं ट्रॅफिक वाढलं. अरुंद रस्ते, भरपूर वाहनं आणि कर्कश्श वाजणारे हॉर्न हे उत्तर भारतातल्या बऱ्याच शहरांत दिसणारं दृश्य तिथंही दिसू लागलं. राजेशभाई म्हणाले, ‘यहाँ ऐसाही होता है!’ आम्ही ‘बरं’ म्हटलं. दुसरं काय म्हणणार होतो? त्या ट्रॅफिकपुढं मला पुण्यातलं ट्रॅफिक फारच शिस्तबद्ध व कमी हॉर्न वाजवणारं वाटायला लागलं. अखेर जवळपास दीड तासानं, म्हणजे साडेआठच्या सुमारास आम्ही त्या हॉटेलमध्ये पोचलो. ते हॉटेल अगदीच जुन्या भागात वसलं होतं. आत जायला एक रॅम्प होता. तिथून कार वर गेली ती थेट रिसेप्शनच्या लॉबीतच जाऊन उभी राहिली. तिथले कर्मचारी लगेच सामान उतरवून घ्यायला तत्परतेनं धावले. पाच मिनिटांत सर्व सोपस्कार करून आम्ही खोल्या ताब्यात घेतल्या. सुदैवानं त्या तळमजल्यावरच होत्या. आम्ही अजिबात फारसे दमलेले नव्हतो. त्यामुळं लगेच आवरून बाहेर पडावं आणि काळभैरवनाथाचं दर्शन घ्यावं असं ठरलं. माझा मेव्हणा हर्षद नेहमी काशीला सहली घेऊन जातो. त्यानं सांगितलं होतं, की हा काळभैरवनाथ म्हणजे काशीचा कोतवाल आहे. त्याचं आधी दर्शन घ्यायचं व मगच ‘काशी विश्वनाथा’ला जायचं. आमच्या हातात वेळ होता व ते मंदिरही तिथून जवळच होतं, म्हणून मग आम्ही तिकडं निघालो.
हे मंदिरही आमच्या हॉटेलपासून अगदी चालत जाण्याच्या अंतरावर होतं. आम्ही पाच मिनिटांत तिथं पोचलो. तिथं सरळ जाणारा मार्ग बंद केला होता आणि तिथं उभे असणारे पोलिस दुसरीकडून जा, असं सांगत होते. मग आम्ही त्या चौकातच एका दुकानात चपला काढल्या आणि चालत त्या रस्त्याने निघालो. रस्ते म्हणजे सगळे गल्ली-बोळच होते. काशीचा हा अगदी जुना भाग होता. अगदी लागून लागून असलेली घरं, मधून जाणारा बोळवजा रस्ता, तिथं दुचाकी गाड्यांची बेशिस्त ये-जा, जोरजोरात हॉर्न वाजवणं, स्थानिक विरुद्ध पर्यटक यांच्यातली वादावादी, मधेच गोमातांची ये-जा हे सगळं बघून आम्ही तर भेदरूनच गेलो. तरीही आम्ही त्या लाइनीचं शेवटचं टोक शोधलं व तिथं उभे राहिलो. सुमारे दीड तास त्या रांगेत अशक्य असा वैताग सहन केल्यावर आम्हाला ते काळभैरवनाथ मंदिर दिसलं. मला एकदम लक्षात आलं, की आज गुड फ्रायडे, उद्या शनिवार, रविवार. म्हणजे लाँग वीकएंड... त्यामुळंच तिथं एवढी प्रचंड गर्दी झाली होती. त्यात आमच्यासारखे बाहेरच्या राज्यातून आलेले पर्यटक तर होतेच; पण उत्तर प्रदेशच्या अन्य भागांतून एक किंवा दोन दिवसांसाठी काशी दर्शनाला आलेलेही कित्येक लोक होते. आमची वेळच चुकली होती. अर्थात एवढ्या तपश्चर्येनंतर काळभैरवनाथाचं मनोभावे दर्शन झालंच. मी जरा वाकून नमस्कार करत होतो तोवर तिथल्या पुजाऱ्याने तिथं पडलेला एक गुलाबाचा हार माझ्या गळ्यात घातला. शिवाय आणखी एक तुळशीचा हारही दिला. मला खूप आनंद झाला. एवढा वेळ रांगेत थांबल्याचं चीज झालं असं वाटलं. जणू हा प्रसादच! मग बाहेर येऊन मी तो तुळशीचा हार धनश्रीच्या गळ्यात घातला व आमचा फोटो काढून घेतला. नंतर तेच हार साई व वृषालीला दिले आणि त्यांचेही फोटो काढले. आमच्या चपला ठेवल्या होत्या ते दुकानदार दुकान बंद करून गेले होते. दुकानाच्या पायऱ्यांशी आमच्या व इतरही भाविकांच्या चपला तशाच लोळत पडल्या होत्या. त्या घेतल्या आणि निघालो. आता जवळपास दहा वाजून गेले होते. भूक लागली होती. त्याच गल्लीत एक ‘अन्नपूर्णा कॅफे’ नावाचं छोटेखानी हॉटेल दिसलं. तिथं आत बेसमेंटमध्ये काही पर्यटक जेवताना दिसले. मग आम्हीही तिथं गेलो. नंतर लक्षात आलं, की एक बाई, तिचा नवरा व त्यांचा अगदी पाच-सहा वर्षांचा छोटा मुलगा मिळून ते हॉटेल चालवत आहेत. बाकी स्टाफ कुणीच नव्हता. त्या बाई अगदी साध्या होत्या. त्या कुणालाच नाही म्हणत नव्हत्या. सगळ्यांच्या ऑर्डर घेत होत्या. आम्ही ऑर्डर दिल्यावर आमच्या हे लक्षात आलं. पण आता पर्याय नव्हता. वरच्या बाजूला किचन होतं. तिथून कधी त्या, तर कधी नवरा त्या डिशेस खाली घेऊन येत होते. तो लहान मुलगाही बिचारा सतत धावपळ करत होता. आम्हाला तिथून उठून जावंसंही वाटेना. ती फॅमिली गरजू वाटत होती. मग आम्ही प्रचंड भूक लागली असूनही संयमाने आमची डिश येण्याची वाट पाहिली. ती ठीकठाकच होती. पण अत्यंत भूक लागल्यानं तीही गोडच मानून घेतली. तिथून निघून चालतच हॉटेलवर आलो. 
दुसऱ्या दिवशी आता मुख्य सोहळा म्हणजे काशी-विश्वनाथाचं आणि अर्थात गंगेचं दर्शन. सकाळी उठल्यावर शॉवरमधून आलेल्या गंगेत स्नान केलं. आम्ही लवकर उठलो होतो. आमच्या हॉटेलच्या बरोबर समोर एक पार्क होतं. मग धनश्री व मी तिथं चक्कर मारायला गेलो. पार्क छोटेखानी होतं, पण चांगलं होतं. मधोमध एक तळं होतं. त्यात कारजं होतं. आजूबाजूला ‘नगर निगम, वाराणसी’नं छोटेखानी जिम, जॉगिंग ट्रॅक वगैरे सोयी केल्या होत्या. तिथं भरपूर लोक सकाळी चालायला आले होते. आम्ही पार्कच्या दुसऱ्या बाजूला गेलो, तेव्हा त्या पार्कचं नाव ‘भारतेंदू हरिश्चंद्र पार्क’ असं आहे, हे दिसलं. हे हिंदी साहित्यातलं व रंगभूमीवरचं मोठं नाव. त्यांना आधुनिक हिंदी साहित्य व रंगभूमीचचे जनक मानलं जातं. (सन १८५० मध्ये जन्मलेल्या हरिश्चंद्रांना अवघं ३४ वर्षांचं आयुष्य लाभलं. मला आपल्या राम गणेश गडकऱ्यांची आठवण झाली.) तिथं त्यांचा पूर्णाकृती पुतळाही होता. मग आम्ही पार्कच्या दुसऱ्या बाजूने काशी विश्वनाथाकडं जाणाऱ्या चौकाकडं आलो. तिथं रस्ते बंद केलेले दिसले, तेव्हा कळलं, की मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ काशी विश्वनाथाच्या दर्शनाला येत आहेत. थोड्याच वेळात त्यांचा ताफा तिथून गेला. मग रस्ते मोकळे झाले. त्या चौकात शास्त्रीजींचा पांढरा अर्धपुतळा होता. त्याची इतकी दुरवस्था झाली होती, की विचारू नका. खरं तर हे शास्त्रीजींचं गाव. इथं विमानतळाला त्यांचं नाव आहे आणि तिथं व इतरत्रही त्यांचे अनेक पुतळे आहेत. पण या चौकातल्या पुतळ्याकडं काही कुणाचं लक्ष नव्हतं. असो.

तिथंच कोपऱ्यात अनेक स्टॉल होते. तिथं ‘मामा की हिंग कचौंडी’ असा एक स्टॉल दिसला. मग आम्ही एक कचौडी घेतली. मटार उसळीसारख्या हिंग घातलेल्या खमंग सरसरीत मिश्रणात ती कचौडी कुस्करून देत होते. एका कचौडीनं मन तृप्त झालं. मग शेजारीच ‘कुल्हड’मधला चहा घेतला. परत पार्कमधून चालत हॉटेलवर आलो. आमच्या हॉटेलमध्ये आमचा ब्रेकफास्ट होताच. तो इतर सर्व हॉटेलमध्ये असतो तसाच होता. त्यात इडलीपासून पराठ्यापर्यंत आणि वेगवेगळ्या फळांपासून ते चहा-कॉफीपर्यंत सगळं काही होतं. मग रीतीप्रमाणं ते हेवी ब्रेकफास्ट केला. इथं आम्हाला आमचे दोन स्थानिक मित्र भेटणार होते. शिवम व शुभम अशी त्यांची नावं. ते थोड्याच वेळात आमच्या ऑफिसलाच आले. ते इथलेच राहणारे होते. त्यामुळं पुढचा सर्व दिवस त्यांच्याबरोबरच आम्ही फिरणार होतो. मग आम्ही लगेच चालत चालत काशी विश्वनाथाच्या दर्शनाला गेलो. त्या मगाच्या चौकापासून पुढं ऑटो रिक्षा किंवा मोठ्या वाहनांना परवानगी नाही. ट्रस्टच्या गोल्फ कार्टसारख्या गाड्या येतात. मात्र, त्यांची वाट न पाहता आम्ही सकाळच्या वेळेत तिकडं चालत निघालो. शनिवारचा दिवस होता. त्यामुळं रस्त्यावर भाविकांची भरपूर गर्दी होतीच. बरंच चालल्यावर आम्ही गेट नं. ४ ला पोचलो. इथं शिवमच्या ओळखीच्या एका पोलिस अधिकाऱ्यामुळं आम्हाला पास मिळाला होता. त्यांनी एका कॉन्स्टेबलचा नंबर दिला होता. मग त्याने आम्हाला फोन करून एका ठिकाणी बोलावलं, तिथं आमच्यासारख्या ‘प्रोटोकॉल’च्या पाहुण्यांची बरीच गर्दी होती. अर्थात मुख्य रांग एवढी मोठी होती, की आमची ही गर्दी असली तरी तुलनेनं लवकर आत प्रवेश मिळणार होता. मग त्या कॉन्स्टेबलनं आम्हाला आमचे मोबाइल, बॅगा वगैरे सगळं समोरच्या दुकानांत उपलब्ध लॉकरमध्ये ठेवायला सांगितलं. फक्त एक मोबाइल घेऊन आम्ही आत गेलो. तिथं पुन्हा एका ठिकाणी सगळ्यांची नावं नोंदवून घेत होते. मग जो एक मोबाइल होता, तोही तिथल्या पोलिस लॉकरमध्ये ठेवावा लागला. आतला परिसर भव्य आहे. अगदी समोरच ती ग्यानव्यापी मशीद दिसली. तिला काटेरी कुंपणांनी बंदिस्त केलं आहे. त्याच्या बाजूला सगळा कॉरिडॉर व मंदिर परिसर आहे. हा सगळा अलीकडच्या काळात विकसित झालेला भाग आहे आणि आधी असं नव्हतं. काशी विश्वनाथाच्या मंदिराविषयी माझा जो समज होता, तसं तिथं काही आढळलं नाही. मला वाटत होतं, आपल्याकडच्या पंढरपूर किंवा अंबाबाईच्या देवळासारखं जुनं, पाषाणांचे खांब असलेलं देऊळ असेल. मात्र, तसं काही नव्हतं. आत त्या मोकळ्या जागेच्या मध्यभागी एक अगदी छोटंसं मंदिर होतं. त्याचा कळसही जेमतेम पंधरा फूट वगैरे असेल. या जागेत भारतीयाचं सर्वांत महत्त्वाचं श्रद्धास्थान, मोक्षाचं द्वार वास करून होतं. मला त्या वातावरणात फारच भरून आलं. आतल्या संगमरवरी फरशांवरून आम्ही भराभर पुढं चालत होतो. शुभमनं आम्हाला थेट त्या मंदिराच्या आत नेलं. आम्ही आत गेल्यावर पोलिसानं ते दार लावून घेतलं. आम्ही नशीबवान ठरलो. मग अगदी थोड्या वेळात काशी विश्वनाथाच्या शिवलिंगाचं दर्शन झालं. हे शिवलिंग जरा खाली आहे. त्यामुळं सतत ‘नीचे देखो, नीचे देखो’चे घोष ऐकू येत होते. रांगेचा रेटा पुष्कळ होता, तरीही आम्हाला बरंचसं चांगलं दर्शन झालं, असं म्हणता येईल. तिथून बाहेर आल्यावर मग आम्ही त्या आवारातल्या इतर मंदिरांचं दर्शन घेतलं. शेजारी एका ओवरीसारख्या जागेत जरा वेळ बसलो, तिथं एका देवासमोर पुजारी तांदूळ देत होते. ते जवळ ठेवायचे आणि घरच्या धान्यात टाकायचे म्हणे. काशीचे प्रसिद्ध पंडे किंवा तत्सम मंडळींचा मला तरी तिथं कुठेही मागमूस दिसला नाही किंवा त्यांचा काही त्रासही झाला नाही.
आम्ही अगदी लवकरच दर्शन घेऊन बाहेर आलो. आमच्या स्थानिक मित्रांमुळं हे शक्य झालं होतं. आता त्यांनी आम्हाला जुन्या काशीतली सगळी मंदिरं दाखवायचा चंग बांधला. आम्ही आपले त्यांच्या मागोमाग ते गल्लीबोळ फिरू लागलो. असं म्हणतात, की भारतात जितकी प्रसिद्ध शिवालयं आहेत त्यांची एक ब्रँच (काशी खण्ड) वाराणसीत आहेच. पशुपतेश्वराचं मंदिर तर लगेचच दिसलं. एक राधा-रमण मंदिर होतं. तिथं आता वाड्यासारखा भाग होता. आत कुणीच नव्हतं. आम्ही जरा तिथं टेकलो. मग पुन्हा भटकंती सुरू. पिता महेश्वर, सर्व ग्रहांची नावं असलेलं एक संकुल (बुधेश्वर, शुक्रेश्वर वगैरे), पन्नास फूट खोलवर असलेला महादेव अशी अनेक मंदिरं बघत बघत आम्ही आणखी एका मंदिर संकुलात गेलो. तिथून मधल्या रस्त्यानं पुढं गेलो तर तो रस्ता एका घाटावर जात होता. दोन पायऱ्या वर चढून आलो तर समोर एकदम गंगामाई! अहाहा... काल काही हजार फूट उंचावरून पहिल्यांदा गंगेचं दर्शन झालं होतं आणि इथं आता मी तिच्यापासून काही फूट अंतरावर उभा होतो. कुठल्याशा अनामिक आकर्षणानं, ओढीनं, भक्तिभावानं भरलेल्या मनानं मी त्या घाटाच्या पायऱ्या उतरू लागलो... काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं होतं आणि आता गंगामाई बोलावत होती...

(क्रमश:)



-----

(वाराणसी व अयोध्या यात्रेचे आणखी फोटो व रील्स पाहण्यासाठी फेसबुक व इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा.)

----





30 Mar 2026

रूपेरी मुकुटाचे मानकरी- अडूर गोपालकृष्णन

समांतर सिनेमाचे अध्वर्यू
-----------------------------

(पुणे आकाशवाणीवर दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांच्या जीवनावर आधारित ‘रूपेरी मुकुटाचे मानकरी’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेत मी काही भाग लिहिणार आहे. त्यापैकी अडूर गोपालकृष्णन यांच्यावर लिहिलेला भाग नुकताच प्रसारित झाला. या भागासाठी लिहिलेली संहिता...)

अडूर गोपालकृष्णन म्हणजे भारतीय चित्रसृष्टीच्या नभांगणातील एक लखलखतं नक्षत्र. अत्यंत प्रतिभावंत दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते असलेले अडूर गोपालकृष्णन यांना मल्याळम चित्रपटसृष्टीत 'न्यू वेव्ह’ची सुरुवात करण्याचं श्रेय दिलं जातं. केरळी समाजाचे संवेदनशील आणि अतिशय प्रगल्भ चित्रण करणारे  त्यांचे चित्रपट पाहिले, की त्यांच्या प्रतिभेची कल्पना येते.
मौटात्तू गोपालकृष्णन उन्नितन हे त्यांचं मूळ नाव. पुढं त्यांनी त्यांच्या गावाचं नाव घेतलं. त्यांचा जन्म ३ जुलै १९४१ रोजी केरळमधील अडूरजवळ पल्लिकल इथं झाला. त्यांचं कुटुंब कलेची आवड असणारं होतं. त्यांचे वडील स्वयंवंमदत्त माधवन उन्नितन आणि आई गौरी कुंजम्मा यांच्याकडून त्यांना सांस्कृतिक वारसा मिळाला. वयाच्या आठव्या वर्षापासूनच त्यांनी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.  त्यांनी लहानपणीच अनेक नाटकांचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. त्यामुळं गोष्ट सांगण्याची कला त्यांच्या अंगी विकसित झाली. त्यांचं बालपण केरळमधील पारंपरिक 'कथकली' आणि स्थानिक कलांच्या वातावरणात गेलं. त्यांच्या अनेक चित्रपटांत दिसणारी संथ लय आणि दृश्यात्मकता यावर या बालपणीच्या संस्कारांचा मोठा प्रभाव आहे. अडूर यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण स्थानिक शाळांमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी गांधीग्राम रुरल इन्स्टिट्यूटमधून पदवी मिळवली आणि काही काळ सरकारी नोकरीही केली.  मात्र, कलेच्या ओढीमुळं ते सिनेमाकडं वळले. केरळच्या मातीतील कला आणि नाटकांची ओढ यामुळंच ते जागतिक दर्जाचे दिग्दर्शक होऊ शकले, असं म्हणावं लागेल.
पुढं चित्रपट कलेचं औपचारिक शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात आले. अडूर गोपालकृष्णन आणि ‘एफटीआयआय’ यांचं नातं अत्यंत जिव्हाळ्याचं आहे. एका अर्थानं गोपालकृष्णन यांच्या भविष्यातील झळाळत्या कारकिर्दीचा पाया आपल्या पुण्यातच रचला गेला. १९६२ मध्ये अडूर यांनी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी चित्रपट दिग्दर्शन आणि पटकथा लेखन या विषयांत विशेष प्रावीण्य मिळवलं. पुण्यात शिक्षण घेत असतानाच त्यांनी जागतिक दर्जाचे सिनेमे पाहिले. श्रेष्ठ दिग्दर्शक सत्यजित राय यांनी जेव्हा ‘एफटीआयआय’ला भेट दिली होती, तेव्हा अडूर त्यांच्या कामामुळे प्रचंड प्रभावित झाले होते. पुण्यात शिकत असतानाच त्यांना सिनेमा हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून, ते एक प्रभावी कलात्मक माध्यम असल्याचं उमजलं. त्यांनी १९६५ मध्ये आपली पदवी पूर्ण केली.
गोपालकृष्णन अतिशय तब्येतीत सिनेमे तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पाच दशकांहून दीर्घ अशा कारकिर्दीत त्यांनी केवळ १२ पूर्ण लांबीचे चित्रपट तयार केले. त्यांच्या ‘स्वयंवरम’ या १९७२ मध्ये आलेल्या पहिल्याच चित्रपटानं मल्याळी चित्रपटसृष्टीत अक्षरश: क्रांती घडवली. समांतर सिनेमाची ‘नवी लाट’ याच सिनेमापासून मल्याळी चित्रपटसृष्टीत सुरू झाली असं मानलं जातं. यानंतर ‘कोडिअट्टम’, ‘एलिप्पाथायम’, ‘मुखामुखम’, ‘अनंतराम’, ‘मथिलुकल’, ‘विधेयन’,  ‘कथापुरुषन’, ‘निजालुकुथू’, ‘नानू पेन्नुंगल’, ‘ओरू पेन्नुम रंदानम’ आणि ‘पिन्नेयुम’ हे त्यांचे आणखी ११ चित्रपट आले.

‘स्वयंवरम’विषयी बोलायचं तर १९७२ मध्ये आलेला हा चित्रपट 'विस्वम' आणि 'सीता' या प्रेमी युगुलाची कथा आहे. अभिनेता मधू व अभिनेत्री शारदा यांनी यात नायक-नायिकेच्या भूमिका केल्या आहेत. या चित्रपटातील नायक-नायिका आपल्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न करून एका नवीन शहरात, म्हणजे तिरुअनंतपुरम इथं आपलं नवं आयुष्य सुरू करण्यासाठी येतात. सुरुवातीला स्वप्नवत वाटणारं त्यांचं आयुष्य हळूहळू गरिबी, बेरोजगारी आणि आर्थिक अडचणींमुळं कठीण होत जातं. आदर्शवाद आणि कठोर वास्तव यांच्यातील हा संघर्ष अडूर गोपालकृष्णन यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. या चित्रपटाची वैशिष्ट्यं अनेक आहेत. यात अडूर यांनी बरेच तांत्रिक प्रयोग केले. हा 'सिंक साउंड’, म्हणजे' थेट चित्रीकरणाच्या वेळी ध्वनिमुद्रण करणं, या तंत्राचा आणि बाह्य लोकेशन्सचा वापर करणारा पहिला मल्याळी चित्रपट होता. यात व्यावसायिक चित्रपटांप्रमाणे गाणी, नृत्य किंवा उगाच घातलेला विनोद नव्हता. चित्रपटाची सुरुवात एका बस प्रवासाच्या पाच मिनिटांच्या दीर्घ शॉटनं होते. हे दृश्य त्या काळातील चित्रपट निर्मितीच्या पद्धतीपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. सुरुवातीला या चित्रपटाला चित्रपटगृहांत फारसा प्रतिसाद मिळाला नाही, परंतु राष्ट्रीय पुरस्कारांनंतर तो प्रचंड गाजला. १९७३ च्या विसाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटानं चार प्रमुख पुरस्कार पटकावले. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्णकमळ, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अडूर गोपालकृष्णन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री शारदा आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रण मंकडा रविवर्मा असे हे चार पुरस्कार होते. हा चित्रपट आजही त्याची कथनशैली आणि मानवी भावभावनांच्या वास्तववादी चित्रणामुळं जगभरातील सिनेप्रेमींच्या अभ्यासाचा विषय आहे.
अडूर यांचा १९८१ मध्ये आलेला ‘एलिप्पथायम’ हा चित्रपट अडूर यांच्या कारकिर्दीतील मास्टरपीस मानला जातो. या शीर्षकाचा शब्दश: अर्थ आहे उंदराचा पिंजरा. केरळमधील तत्कालीन सरंजामशाही व्यवस्थेचा अंत होत असताना, बदलत्या काळाशी जुळवून न घेऊ शकणाऱ्या एका माणसाची ही कथा आहे. या चित्रपटाला लंडन चित्रपट महोत्सवात सर्वांत कल्पक चित्रपट' म्हणून पुरस्कार मिळाला होता. यानंतर अडूर यांनी १९८४ मध्ये ‘मुखामुखम’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. हा चित्रपट राजकीय विचारसरणी आणि कम्युनिस्ट चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. एका क्रांतिकारक नेत्याचं एकाकीपण आणि त्याच्याबद्दल समाजात असणाऱ्या प्रतिमांचा संघर्ष यात पाहायला मिळतो. यापुढचा त्यांचा चित्रपट होता १९८७ मध्ये आलेला ‘अनंतराम’. हा चित्रपट मानवी मानसशास्त्र आणि कथानक मांडण्याच्या शैलीवर आधारित आहे. 'सत्य' आणि 'कल्पना' यातील पुसट रेषा यात एका तरुणाच्या दृष्टिकोनातून यात दाखविण्यात आली आहे. यानंतर अडूर यांचा महत्त्वाचा चित्रपट म्हणजे १९९० मध्ये आलेला ‘मथिलुकल’. या शीर्षकाचा अर्थ आहे भिंती. प्रसिद्ध लेखक वैकोम महंमद बशीर यांच्या आत्मचरित्रात्मक कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. यात मल्याळी सुपरस्टार मामुट्टी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. तुरुंगातील एका कैद्याचं एका अदृश्य महिला कैद्याशी जडलेलं नातं यात अतिशय हळुवारपणे दाखवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यात त्या महिला कैद्याचा फक्त आवाज ऐकू येतो.
अडूर यांचा पुढचा चित्रपट म्हणजे १९९३ मध्ये आलेला ‘विधेयन’. याचा शब्दश: अर्थ आहे चापलूस. हा चित्रपट सत्ता, अत्याचार आणि गुलामगिरी यांचे चित्रण करतो. एका क्रूर जमीनदाराचा त्याच्या नोकरावर असणारा मानसिक आणि शारीरिक प्रभाव या सिनेमात अंगावर येणाऱ्या वास्तववादाने मांडला आहे. यातही मामुट्टी यांनी साकारलेली खलनायकी भूमिका संस्मरणीय ठरली आहे.
अडूर यांनी २००२ मध्ये ‘निजालुकुथू’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. फाशी देणाऱ्या एका जल्लादाची मानसिकता आणि त्याला वाटणारी अपराधीपणाची भावना या चित्रपटात केंद्रस्थानी आहे. अडूर यांचे चित्रपट केवळ कथा सांगत नाहीत, तर ते प्रेक्षकांना त्या काळातील सामाजिक आणि मानसिक स्थितीचा विचार करायला भाग पाडतात. यामुळंच भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अडूर गोपालकृष्णन यांचं स्थान केवळ एक दिग्दर्शक एवढंच नसून ते समांतर चित्रपट चळवळीचे एक महत्त्वपूर्ण स्तंभ आहेत. जागतिक स्तरावर सत्यजित राय यांच्यानंतर भारतीय सिनेमाची ओळख ज्या मोजक्या दिग्दर्शकांमुळं टिकून आहे, त्यांत अडूर यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल.
अडूर यांच्या योगदानाचा आढावा घेताना, 'न्यू वेव्ह' सिनेमाची मुहूर्तमेढ ही त्यांची कामगिरी अगदी ठळक म्हणावी लागेल. 'स्वयंवरम'द्वारे त्यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीत एका नव्या पर्वाची सुरुवात केली, हे पुन्हा एकदा अधोरेखित करावंसं वाटतं. गाणी, मारामारी आणि अतिरंजित नाटकीपणाला फाटा देऊन, साधेपणा आणि वास्तववादाचा स्वीकार करणारा हा सिनेमा भारतीय प्रेक्षकांसाठी नवा होता. अडूर यांच्या चित्रपटांचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची 'दृकश्राव्य भाषा'. ते संवादांपेक्षा दृश्ये आणि ध्वनी यांच्या माध्यमातून कथा सांगण्यावर भर देतात. पात्रांची शांतता, निसर्गाचे आवाज आणि मानवी हालचालींतून ते चित्रपटाचा आशय समृद्ध करतात. याखेरीज त्यांचे चित्रपट केवळ वरवरची गोष्ट सांगत नाहीत, तर ते मानवी मनाचा आणि सामाजिक व्यवस्थेचा सखोल वेध घेतात. विशेषत: 'एलिप्पथायम'मध्ये त्यांनी सरंजामशाही मानसिकतेचा ऱ्हास कसा होतो, हे प्रभावीपणे दाखवलं आहे. 'विधेयन’मधून सत्ता आणि गुलामगिरीच्या मानसिकतेवर अडूर यांनी भाष्य केलं. त्यांच्या कथांमध्ये केरळचा समाज, तिथलं राजकारण आणि मानवी नातेसंबंधांचे गुंतागुंतीचे पदर उलगडतात.
याशिवाय अडूर यांचं महत्त्वाचं योगदान म्हणजे केरळमधील फिल्म सोसायटी चळवळीचे ते जनक आहेत. चित्रलेखा फिल्म सोसायटीची स्थापना करून, त्यांनी जागतिक सिनेमा सामान्य मल्याळी प्रेक्षकांपर्यंत पोचवला. चित्रपट निर्मितीसोबतच चित्रपट साक्षरता वाढवण्यात त्यांचं योगदान मोलाचे आहे. एफटीआयआयमधून प्रक्षिक्षण घेतल्यामुळं चित्रपटांच्या तांत्रिक बाबींतही ते जागरूक असतात. तांत्रिक शिस्तीबरोबरच छायाचित्रण, संपादन आणि ध्वनिमुद्रण या प्रत्येक बाबतीत ते अत्यंत चोखंदळ असतात. त्यांच्या चित्रपटातील प्रत्येक 'फ्रेम' एखाद्या चित्रासारखी रेखीव असते. थोडक्यात सांगायचं तर अडूर गोपालकृष्णन यांनी भारतीय सिनेमाला केवळ मनोरंजन न मानता 'एक गंभीर कलाप्रकार' म्हणून जागतिक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या चित्रपटांनी अनेक पिढ्यांच्या दिग्दर्शकांना प्रेरणा दिली असून, 'कलात्मक सिनेमा' कसा असावा, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे.
अडूर यांच्या चित्रपट निर्मितीची शैली अतिशय शिस्तबद्ध आणि तांत्रिकदृष्ट्या अचूक असते. त्यांच्या तंत्राची काही महत्त्वाची वैशिष्ट्यं सांगायची, तर संथ गती आणि 'दीर्घ शॉट’ हे एक ठळक वैशिष्ट्य जाणवतं. त्यांच्या चित्रपटांची गती मुद्दाम संथ ठेवली जाते. प्रेक्षकांना पात्राच्या मानसिक अवस्थेत शिरता यावं, यासाठी ते लांब शॉट वापरतात. घाईघाईनं दृश्यं बदलण्याऐवजी, ते कॅमेरा एका जागी स्थिर ठेवून त्या दृश्यातील नैसर्गिक हालचाली टिपण्यावर भर देतात. त्यांच्या सिनेमांत ध्वनीचा कल्पक वापर दिसून येतो. म्हणून त्यांच्या सिनेमात पार्श्वसंगीत  खूप कमी असतं. त्याऐवजी ते नैसर्गिक ध्वनींचा वापर करतात. उदाहरण द्यायचं तर दारं उघडण्याचा आवाज, पावलांचा आवाज किंवा पक्ष्यांचा चिवचिवाट असे आवाज टिपण्यावर ते भर देतात. 'एलिप्पथायम'मध्ये उंदराचा पिंजरा पडण्याचा आवाज किंवा पात्रांची शांतता ही संवादांपेक्षा जास्त प्रभावी ठरते, हे अनेक प्रेक्षकांनी अनुभवलं आहे. 'फ्रेमिंग' आणि रचना याबाबतही अडूर गोपालकृष्णन आपलं वेगळेपण राखून आहेत. अडूर यांचे प्रत्येक दृश्य एखाद्या चित्रासारखं असतं. ते पात्रांना खिडक्या, दारं किंवा खांबांच्या मागे अशा प्रकारे उभे करतात, की त्यातून पात्राची मानसिक कोंडी किंवा एकाकीपण स्पष्टपणे दिसतं. 'क्लोज-अप' शॉट्सचा वापर ते खूप मर्यादित आणि फक्त महत्त्वाच्या क्षणीच करतात. कमीत कमी साधनांतून जास्तीत जास्त आशय व्यक्त करण्यावर ते विश्वास ठेवतात. त्यांच्या चित्रपटात भपकेबाज सेट्स नसतात, तर केरळमधील जुनी घरं आणि निसर्गाचा नैसर्गिक वापर केला जातो. पात्रांचे संवादही मोजके आणि अर्थपूर्ण असतात. अडूर स्वतः त्यांच्या चित्रपटांच्या संकलन प्रक्रियेत पूर्णपणे गुंतलेले असतात. त्यांच्या मते, संकलन म्हणजे केवळ दृश्यं जोडणे नव्हे, तर चित्रपटाला एक लय देणं होय. कथेचा प्रवाह संथ असला तरी तो कधीही कंटाळवाणा होणार नाही, याची काळजी ते संकलनाद्वारे घेतात. त्यांच्या या तांत्रिक शिस्तीमुळंच त्यांचे चित्रपट हे केवळ 'सिनेमा' न राहता एक ‘दृश्य अनुभव’ ठरतात.
अडूर गोपालकृष्णन यांच्या चित्रपटांच्या दृश्यात्मक सौंदर्यामध्ये दिग्गज छायाचित्रकार मंकडा रविवर्मा यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. या दोघांच्या जोडीने मल्याळम सिनेमाला एक जागतिक ओळख मिळवून दिली. मंकडा रविवर्मा आणि अदूर यांचा नैसर्गिक प्रकाशावर खूप विश्वास आहे. त्यांच्या चित्रपटात कृत्रिम प्रकाशाचा वापर कमीत कमी असायचा. घरातील खिडकीतून येणारा उजेड किंवा झाडांच्या सावलीतून पडणारा प्रकाश यांचा वापर करून ते पात्रांच्या मनातील भावना पडद्यावर उतरवत असत. केरळमधील जुन्या वास्तू, हिरवागार निसर्ग आणि पावसाळी वातावरण मंकडा रविवर्मा यांनी अतिशय जिवंतपणे टिपलंय.
'स्वयंवरम' आणि 'एलिप्पथायम'मधील दृश्यं पाहताना प्रेक्षकांना आपण स्वतः त्या वातावरणात आहोत, असा भास होतो. मंकडा यांनी केवळ सुंदर दृश्यं टिपली नाहीत, तर कॅमेरा अँगलच्या माध्यमातून पात्रांचं अंतर्मन मांडलं. उदाहरण द्यायचं तर 'एलिप्पथायम' मध्ये मुख्य पात्राची हतबलता दाखवण्यासाठी ते अनेकदा पात्राला दाराच्या चौकटीत किंवा खांबांच्या अडथळ्यात चित्रित करत, त्यामुळं त्या पात्राचा कोंडमारा प्रेक्षकांना जाणवतो. अडूर यांच्याप्रमाणेच मंकडा यांची शैलीही 'मिनिमलिस्टिक' होती. अनावश्यक कॅमेरा हालचाली करण्याऐवजी ते एका स्थिर शॉटमध्ये जास्तीत जास्त अर्थ भरण्यावर भर देत. यामुळे चित्रपटात एक प्रकारची शांतता आणि गांभीर्य निर्माण होत असे. अडूर गोपालकृष्णन यांनी आपल्या कारकिर्दीतील बहुतांश महत्त्वाचे चित्रपट मंकडा रविवर्मा यांच्यासोबतच केले. या दोघांमधील सामंजस्य इतकं होतं, की अडूर यांना काय अपेक्षित आहे हे मंकडा शब्दांशिवाय ओळखून कॅमेऱ्यात कैद करत असत. मंकडा रविवर्मा यांच्या कॅमेऱ्याने अडूर यांच्या कथांना 'काव्यात्मक वास्तववाद' दिला. त्यांच्या छायाचित्रणामुळंच हे चित्रपट आजही तांत्रिकदृष्ट्या कालबाह्य वाटत नाहीत.
अडूर यांनी भारतीय सिनेमाला ‘सिनेमाची भाषा’ शिकवली. त्यांच्या प्रभावामुळं अनेक तरुण दिग्दर्शकांनी व्यावसायिक गणितं सोडून कलात्मक चित्रपट तयार करण्याचं धाडस केलं. अडूर यांची शिस्त आणि त्यांचं सौंदर्यशास्त्र यांचा प्रभाव कन्नड सिनेमांत गिरीश कासारवल्ली, मल्याळी सिनेमांत शाजी एन. करुण आणि जागतिक स्तरावरील अनेक दिग्दर्शकांवर पडलेला दिसतो. मराठीतील तरुण दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याच्याही कलाकृतींवर अडूर यांच्या शैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. आपली संस्कृती आणि मातीतील कथा प्रामाणिकपणे मांडल्या, तर त्या जागतिक स्तरावर कशा पोहोचवता येतात, याचा वस्तुपाठ अडूर यांनी नव्या पिढीला घालून दिला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. महागडे सेट्स नसतानाही केवळ उत्कृष्ट पटकथा आणि तांत्रिक अचूकतेच्या जोरावर दर्जेदार चित्रपट कसे तयार करता येतात, हे अडूर यांनी सिद्ध केलंय.
अडूर गोपालकृष्णन हे केवळ दिग्दर्शक नाहीत, तर ते एक प्रगल्भ लेखक आणि विचारवंतही आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या सर्व चित्रपटांच्या पटकथा त्यांनी स्वतः लिहिल्या आहेत. त्या केवळ संवादरूपी नसून, त्यात दृश्यांचं सविस्तर वर्णन असतं. शिवाय त्यांनी चित्रपट या विषयावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यातील 'सिनेमायुडे लोकं' (अर्थ : चित्रपटाचे जग) या पुस्तकाला १९८३ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. चित्रपटाच्या व्याकरणानुसार त्यांनी लिहिलेलं 'दी एक्सपीरियन्स ऑफ सिनेमा' हे पुस्तक चित्रपट अभ्यासाच्या विद्यार्थ्यांसाठी आजही मार्गदर्शक मानलं जातं.
अडूर यांनी सुरू केलेल्या  चित्रलेखा फिल्म सोसायटीमुळं केरळमधील सर्वसामान्य प्रेक्षकांना जागतिक सिनेमा, उदाहरणार्थ कुरोसावा, बर्गमन, गोदार्द यांचे चित्रपट, पाहण्याची संधी मिळाली. आज केरळमध्ये जो सिनेप्रेमी वर्ग आहे, त्याचं मोठं श्रेय अडूर यांच्या या उपक्रमाला जातं. थोडक्यात सांगायचं, तर अडूर गोपालकृष्णन यांनी भारतीय सिनेमाला 'मनोरंजन' या चौकटीतून बाहेर काढून, त्याला 'तात्त्विक आणि राजकीय अधिष्ठान' प्राप्त करून दिलं.
अडूर यांचं व्यक्तिमत्त्व शिस्तप्रिय आहे. चित्रपटाच्या सेटवर शांतता राखणं आणि प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्म नियोजन करणं हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या पत्नी सुनंदा यांनी त्यांच्या कलात्मक प्रवासात त्यांना मोठी साथ दिली. २०१५ मध्ये त्यांच्या निधनानंतर अडूर यांनी काही काळ चित्रपट निर्मितीपासून विश्रांती घेतली होती. इतके मोठे जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक असूनही, अडूर आजही अतिशय साधे आयुष्य जगतात. त्यांना अनावश्यक प्रसिद्धी किंवा झगमगाटात राहणे आवडत नाही. अगदी अलीकडं म्हणजे २०१६ मध्ये त्यांनी 'पिन्नेयुम' हा चित्रपट दिग्दर्शित केला. यात दिलीप आणि काव्या माधवन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट गुन्हेगारी आणि मानवी लोभावर आधारित होता. आज वयाच्या ८५ व्या वर्षीही ते स्थानिक चित्रपट महोत्सवांमध्ये सक्रिय असतात. ते आजही नवीन पिढीच्या चित्रपटांचे बारकाईने निरीक्षण करतात आणि त्यावर परखड मते मांडतात. ते एका चित्रपटासाठी खूप वेळ घेतात. त्यांच्या दोन चित्रपटांमध्ये अनेकदा ४ ते ५ वर्षांचं अंतर असतं; कारण ते पटकथेवर खूप सखोल काम करतात. त्यांच्या चित्रपटांप्रमाणंच त्यांना खऱ्या आयुष्यातही केरळच्या निसर्गाची आणि तिथल्या पारंपरिक वास्तुकलेची खूप ओढ आहे.
अडूर गोपालकृष्णन यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा ‘इमेजेस/रिफ्लेक्शन्स', अर्थात बिंब-प्रतिबिंब या शीर्षकाचा एक अप्रतिम माहितीपट प्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांनी ‘एनएफडीसी’साठी तयार केला आहे. हा माहितीपट केवळ अडूर यांच्या आयुष्याचा प्रवास नाही, तर त्यांच्या सिनेमाच्या भाषेचा शोध आहे. कासारवल्लींनी तो अतिशय संथ आणि लयबद्ध पद्धतीने मांडला आहे. या माहितीपटाची रचना पाच भागांत करण्यात आली आहे. कासारवल्लींनी अडूर यांच्या कामाची विभागणी त्यांच्या सिनेमातील प्रतिमांनुसार केली आहे. यात अडूर यांच्या चित्रपटांमधील ध्वनी, शांतता आणि प्रतिमा  यांचा वापर कसा केला जातो, यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. अडूर गोपालकृष्णन हे केवळ कथा सांगत नाहीत, तर ते माणसाच्या अस्तित्वाचा, सत्तेचा आणि मानवी स्वभावातील गुंतागुंतीचा शोध घेतात. 'स्वयंवरम'पासून ते त्यांच्या नंतरच्या चित्रपटांपर्यंतचा हा प्रवास यात उलगडतो. अडूर यांच्यावर सत्यजित राय यांच्या सिनेमाचा असलेला प्रभाव आणि त्यातून त्यांनी स्वतःची एक वेगळी, स्वतंत्र 'मल्याळम' सिनेसृष्टी कशी उभी केली, याचं चित्रण या माहितीपटात आहे. केरळची भूमी, तिथली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती त्यांच्या सिनेमात कशी अविभाज्य भाग असते, हे कासारवल्लींनी बारकाईनं टिपलं आहे. अडूर स्वतः त्यांच्या सेटवरचे अनुभव, त्यांची शिस्त आणि कॅमेऱ्यामागचा त्यांचा दृष्टिकोन यावर बोलतात. अस्पष्ट शेवट किंवा ज्याला आपण 'ओपन एंडेड' सिनेमे म्हणतो, तो अडूर यांच्या सिनेमाचा आत्मा आहे. प्रेक्षकांना सगळंच ताटात वाढून न देता, त्यांना विचार करायला लावणं आणि सिनेमा संपल्यावरही तो डोक्यात तसाच चालू राहणं, हे त्यांच्या शैलीचं वैशिष्ट्य. एक दिग्दर्शक प्रेक्षकांच्या बुद्धिमत्तेचा कसा आदर करतो, हे कासारवल्लींनी या माहितीपटात खूप प्रभावीपणे मांडलंय. या दोन्ही दिग्दर्शकांनी या माहितीपटात मारलेल्या गप्पा अनेक सिनेमाप्रेमींना पर्वणीसारख्याच वाटतील, यात शंका नाही.
अडूर गोपालकृष्णन यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी तयार केलेले माहितीपट. चित्रपटांप्रमाणेच माहितीपटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि कलेचं महत्त्वपूर्ण दस्तऐवजीकरण त्यांनी केलं आहे. अडूर यांनी प्रामुख्याने केरळच्या समृद्ध कलापरंपरांवर आधारित दर्जेदार माहितीपट तयार केले आहेत. यात कथकली, कुडियाट्टम आणि मोहिनीअट्टम यांसारख्या शास्त्रीय नृत्य आणि नाट्य प्रकारांचा सखोल अभ्यास पाहायला मिळतो. याशिवाय त्यांनी कथकली कलाकार 'गुरू चेंगन्नूर' आणि 'कलामंडलम गोपी' यांसारख्या थोर कलाकारांच्या जीवनावर आणि कलेवर आधारित माहितीपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या ५४ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३० लघुपट आणि माहितीपट तयार केले आहेत. त्यांचे माहितीपट केवळ माहिती देणारे नसून, ते कलात्मक आणि सौंदर्यानुभव देणारे असतात. त्यांनी या माध्यमाचा वापर करून पारंपरिक कलांचे बारकावे जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहेत. सन २००० मध्ये आलेला 'कलामंडलम गोपी' आणि २००२ मध्ये आलेला 'कुडियाट्टम' हे त्यांचे काही गाजलेले माहितीपट आहेत.
एवढी उत्तुंग कामगिरी करणारे अडूर गोपालकृष्णन यांना भरपूर पुरस्कार लाभले, यात आश्चर्य नाही. ते भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक पुरस्कार विजेत्यांपैकी एक आहेत. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकूण १६ वेळा मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून त्यांना स्वयंवरम, मुखामुखम, अनंतराम, मथिलुकल आणि आणि विधेयन या चित्रपटांसाठी, तर सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून स्वयंवरम, एलिप्पथायम, कथपुरुषन आणि निजालुकुथू या चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार लाभले आहेत. केंद्र सरकारतर्फे १९८४ मध्ये ‘पद्मश्री’ आणि २००६ मध्ये ‘पद्मविभूषण’ हे नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांना ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटचा पुरस्कार आणि फ्रेंच सरकारचा 'लिजन ऑफ ऑनर' हा अत्यंत मानाचा पुरस्कारही मिळाला आहे.
चित्रपटसृष्टीतील त्यांच्या या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना सन २००४ चा सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. अशा या श्रेष्ठ दिग्दर्शकाला मानाचा मुजरा…

----

हा भाग यू-ट्यूबवर ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

----

सोहराब मोदी यांच्यावरील भाग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

----

9 Mar 2026

रूपेरी मुकुटाचे मानकरी – आशा भोसले

रूपेरी मुकुटाचे मानकरी – आशा भोसले
-------------------------------------------------


(पुणे आकाशवाणीवर दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांच्या जीवनावर आधारित ‘रूपेरी मुकुटाचे मानकरी’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेत मी काही भाग लिहिणार आहे. त्यापैकी आशा भोसले यांच्यावर लिहिलेला भाग नुकताच प्रसारित झाला. या भागासाठी लिहिलेली संहिता...)


(नोंद - संहिता बरीच दीर्घ झाल्यामुळे कार्यक्रमात सर्वच गोष्टी समाविष्ट झाल्या नाहीत. खाली कार्यक्रमाची लिंक दिली आहे. मूळ अर्ध्या तासाचा कार्यक्रम वाढवून ४० मिनिटांचा करण्यात आला. तरीही या संहितेतील काही गोष्टी वगळाव्या लागल्या. त्यामुळे ही मूळ संहिता जरूर वाचावी.)

------

श्रोते हो, नमस्कार!

आशा भोसले… भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुरेल स्वप्न… आवाजाच्या दुनियेतील एक महान व्यक्तिमत्त्व… कमालीची वैविध्यपूर्ण गाणी गाणारी ज्येष्ठ गायिका…. अतिशय खडतर अशा संघर्षातून तावून-सुलाखून बावनकशी सोन्यासारखी लखलखणारी एक खंबीर स्त्री… स्वयंपाकाच्या आवडीपासून ते गायकांच्या नकला करण्यापर्यंत अनेकविध कलागुणा जोपासणाऱ्या आणि वयाच्या नव्वदीतही तरुणांना लाजवेल अशा उत्साहात वावरणाऱ्या जणू एखाद्या मोहक आजीबाई… आशाताईंचं नाव घेतलं, की त्यांच्या एवढ्या प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर सहज उभ्या राहतात. अर्थात या सर्व प्रतिमांना दशांगुळे पुरून उरणारी दैवी सुरांची त्यांची प्रतिभा आणि तिला कठोर मेहनतीची जोड देऊन घडलेली एक असामान्य गायिका ही प्रतिमा सर्वांत लखलखीतपणे कायमच समोर येते. भारतीय चित्रपट संगीत विश्वातली जणू ‘फर्स्ट फॅमिली’ म्हणावी, अशा मंगेशकर कुटुंबात जन्म, मात्र त्या आडनावाचं कोंदण फार लहान वयातच त्यागण्याचं प्राक्तन, त्यानंतर वाट्याला आलेला प्रचंड मोठा संघर्ष आणि अतोनात अडचणींना तोंड देत फक्त गाण्यावर लक्ष केंद्रित करणारी अफाट ताकदीची गायिका… आशा भोसले म्हणजे हे सर्वच….
भारतीय बोलपटांचा इतिहास अद्याप शंभर वर्षांचाही नाही. किंबहुना ‘आलमआरा’ हा पहिला भारतीय बोलपट प्रदर्शित झाला १९३२ मध्ये आणि पुढच्याच वर्षी आशाताईंचा जन्म झाला. याचाच अर्थ ९४ वर्षांच्या बोलपटांच्या इतिहासात आशाताईंची कारकीर्द जवळपास आठ दशकांची आहे. ही नुसती आकडेवारीच थक्क करून टाकणारी आहे. आशाताईंनी या आठ दशकांतील तब्बल ५० वर्षं तरी नक्कीच आपल्या खणखणीत आवाजानं दणाणून टाकली आहेत. केवळ हिंदीच नव्हे, तर जवळपास सर्व भारतीय भाषा, एवढेच नव्हे तर काही जागतिक भाषांतही त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांच्या गायकीएवढं वैविध्य अन्य कोणत्याही गायिकेला आतापर्यंत दाखविता आलेलं नाही. मोठ्या वृक्षाखाली दुसरी झाडं वाढत नाहीत, हा निसर्गनियम आहे. असं असलं तरी लता मंगेशकर या आपल्याच मोठ्या बहिणीच्या आकाशाहून विशाल अशा प्रतिभाप्रभावापासून जाणीवपूर्वक दूर राहून आशाताईंनी आपली स्वतंत्र कारकीर्द घडवली. एवढंच नव्हे, तर लताशी सतत तुलना होण्याचा अटळ धोका पत्करून गायलेल्या प्रत्येक गाण्यावर स्वत:ची नाममुद्रा ठसठशीतपणे उमटवली.
नावाप्रमाणेच आशा भोसले यांचं सगळं जीवन म्हणजे आशेचा, विजिगीषू जीवनेच्छेचा आणि मूर्तिमंत जिद्दीचा प्रवास आहे. त्यांचा जन्म आठ सप्टेंबर १९३३ रोजी सांगलीत झाला. वडील पं. दीनानाथ मंगेशकर यांची बलवंत नाटक कंपनी तेव्हा जोरात होती. त्या कंपनीतर्फे गावोगावी नाटकांचे खेळ होत. कंपनीत दोनशे माणसं कामाला होती. या सर्वांचे पालनपोषण पं. दीनानाथ करत असत. लता आणि मीना यांच्या पाठीवर आशाचा जन्म झाला. आशा जन्मापासूनच तब्येतीनं सुदृढ आणि खोडकर होती. कंपनीत सर्वांच्या चहापाण्यासाठी भलंमोठं दुधाचं भांडं असे. त्यावर येणारी सगळी साय लहानगी आशा गट्टम करत असे. मी या सायीवरच वाढले, म्हणून नव्वदीपार जगले, असं स्वत: आशाताईंनी एका मुलाखतीत मिश्कीलपणे सांगितलं आहे. लता आणि मीना यांना वडील गाणं शिकवत. आशा मात्र हुंदडत खेळत असे. असं असलं तरी तिचा कान तयार होता. वडील तिला लहापणी पठाण, हब्ब अशा टोपणनावांनी हाका मारत असत. लता लहानग्या आशाला कडेवर घेऊन तिचे भरपूर लाड करी. एकदा शाळेत शिक्षक आशाला कशावरून तरी ओरडले. झालं. लताला राग आला. ती आशाला कडेवर घेऊन तडक घरी निघून आली. यापुढं त्या शिक्षकाच्या शाळेत जाणार नाही, असा निश्चय तिनं बोलून दाखवला. या बहिणींचं औपचारिक शिक्षण तिथंच थांबलं. मात्र, जीवनाच्या शाळेत त्या जे काही शिकल्या, त्यातून अनेकांना भरपूर काही शिकायला मिळालं. अतिशय विपरीत परिस्थिती असताना, दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत असताना आपण केवळ गाण्यामुळं जिवंत राहिलो, असं आशाताई सांगतात तेव्हा त्यांच्या कठोर तपश्चर्येची थोडीशी कल्पना येते.
आशाताईंचा स्वभाव लहानपणापासूनच बंडखोर होता. वृत्ती स्वाभिमानी होती. वडील दीनानाथ मंगेशकर यांचं १९४२ मध्ये निधन झालं तेव्हा आशाताई केवळ नऊ वर्षांच्या होत्या. आई व लता या सर्व लहान भावंडांना घेऊन मुंबईत आल्या. तिथं चर्नीरोडला पं. नवरंग नागपूरकर यांच्याकडं महिना पाच रुपये फी देऊन आशाचं संगीत शिक्षण सुरू झालं. तिची परीक्षा घ्यायला शंकरराव व्यास हे तेव्हाचे नामवंत गायक आले होते. आशानं त्यांच्यासमोर परीक्षा म्हणून गाणं म्हणायला सुरुवात केली असताना, त्यांनी तिला थांबवलं आणि सांगितलं, की तुझा पहिला नंबर आला आहे. तुला इथं शिकायची गरज नाही. त्यानंतर त्यांच्याच ओळखीनं वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आशाला गाण्याची संधी मिळाली. तेव्हापासून स्टुडिओतला माइक आणि आशाताई यांचं अद्वैत झालं. या माइकला देव मानून त्यांनी हजारो गाणी गायली. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं जावं, एवढ्या प्रचंड संख्येनं गाणी गायली. माइक समोर असताना दुसरा कुठलाही विचार करायचा नाही; तहानभूक विसरून जायची, फक्त गाणं उत्तम होईल कसं एवढाच ध्यास घ्यायचा अशा तडफेनं आशाताईंनी आपली झळाळती कारकीर्द उभी केली. अर्थात त्या कधीही आपले ते संघर्षाचे दिवस विसरल्या नाहीत.
आशाताईंच्या कारकिर्दीचे सुरुवातीचे दिवस कष्टाचे होते. दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘माझं बाळ’ या १९४३ मध्ये आलेल्या चित्रपटात ‘चला चला नवबाला’ हे आशाताईंनी गायलेलं पहिलं चित्रपट गीत. तेव्हा त्या अवघ्या ९ वर्षांच्या होत्या. हिंदीत त्यांना पहिली संधी मिळाली ती ‘चुनरिया’ या चित्रपटात. हंसराज बहल यांच्या संगीत दिग्दर्शनात त्यांनी ‘सावन आजा’ हे पहिलं गीत गायलं. याच वर्षी त्यांची गाणी असलेला ‘अंधों की दुनिया’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. त्यांनी पहिलं सोलो हिंदी गाणं गायलं ते ‘रात की रानी’ या चित्रपटात. असं असलं तरी खूप मोठं यश आशाताईंना अद्याप मिळालं नव्हतं. त्यातच त्यांनी त्यांच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठ्या असलेल्या गणपतराव भोसले यांच्याबरोबर पळून जाऊन लग्न केलं आणि त्यांच्या आयुष्यानं एक फार खडतर वळण घेतलं. पुढची सात-आठ वर्षं त्यांच्यासाठी अतिशय कठीण होती. त्यांना तीन मुलं झाली. शिवाय उत्पन्न फार नव्हतं. या काळात अक्षरश: एक वेळ जेवून दिवस काढल्याचे अनुभव आशाताई सांगतात. गणपत भोसले तसे लवकरच निवर्तले. त्यानंतर आशाताई आणि उर्वरित मंगेशकर कुटुंब पुन्हा एकत्र आलं. अर्थात ते भविष्यात… पन्नासच्या दशकात आशाताईंचा संघर्ष सुरूच होता. त्या काळात शमशाद बेगम, जोहराबाई अंबालेवाली, अमीरबाई कर्नाटकी, गीता रॉय या गायिकांचा दबदबा होता. लता मंगेशकरांनीही ‘महल’पासून स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं होतं आणि पुढं हे साम्राज्य वाढतच जाणार होतं. त्यामुळं मुख्य नायिकेची गाणी याच गायिकांना मिळायची. या काळात आशाताईंनी पोटापाण्यासाठी मिळेल ते काम स्वीकारलं. कमी बजेटच्या, दुय्यम चित्रपटांसाठी त्या पार्श्वगायन करू लागल्या. ए. आर. कुरेशी, सज्जाद हुसैन, एस. मोहिंदर, सरदार मलिक, गुलाम महंमद या संगीतकारांनी त्यांना प्रामुख्यानं गायची संधी दिली. ‘संगदिल’ या सज्जाद हुसैन यांचं संगीत असलेल्या, १९५२ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात गाणं गायल्यामुळं आशाताईंचं थोडं नाव झालं. याच वर्षी ओ. पी. नय्यर यांनी त्यांना ‘छम छमा छम’ या चित्रपटासाठी फार मोठी संधी दिली. या चित्रपटाच्या एकूण ११ पैकी १० गाणी आशाताईंना गायला मिळाली. त्यानंतर ज्येष्ठ दिग्दर्शक बिमल रॉय यांनी १९५३ मध्ये त्यांच्या ‘परिणीता’ या चित्रपटासाठी आशाताईंना संधी दिली. राज कपूरने १९५४ मध्ये आलेल्या ‘बूट पॉलिश’ या त्याच्या चित्रपटातील गाणी आशाताईंकडून गाऊन घेतली. या चित्रपटातील गाणी गाजली. आशाताईंचं नाव होऊ लागलं. याच काळात संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्याशी आशाताईंचे सूर जुळले. १९५२ ते १९५७ या काळात नय्यर यांनी आशाताईंकडून भरपूर गाणी गाऊन घेतली. त्यातही ‘नया दौर’ या बी. आर. चोपडांच्या चित्रपटातील गाण्यांमुळं आशाताई अतिशय लोकप्रिय झाल्या. ‘माँग के साथ तुम्हारा‘ किंवा ‘साथी हाथ बढाना’, किंवा ‘उडे जब जब झुल्फें तेरी’ ही गाणी तर आजही तितकीच लोकप्रिय आहेत. मुख्य नायिकेची सर्वच्या सर्व गाणी आशाताईंनी पहिल्यांदा या चित्रपटासाठी गायली. ओ. पी. नय्यर यांचा आशाताईंच्या कारकिर्दीत आणि यशात फार मोठा वाटा आहे. यापुढेही जवळपास दहा वर्षं नय्यर-आशा जोडीनं अनेक लोकप्रिय गीतं दिली. आशाताईंच्या आवाजाची ताकद ओपींना कळली होती. त्यांनी या आवाजाच्या अफाट रेंजचा पुरेपूर वापर करून घेतला. ‘आईए मेहेरबाँ’ हे मधुबालावर चित्रित झालेलं गाणं असेल किंवा ’ये हे रेशमी जुल्फों का अंधेरा’सारखं गाणं घ्या, किंवा ‘आँखों से जो उतरी है दिल में’ घ्या, ‘आओ हुजूर तुम को’मधली ती प्रसिद्ध उचकी घ्या; ‘वो हसीन दर्द दे दो’सारखं गाणं घ्या; आशाताईंच्या आवाजाचा पुरेपूर कस लागलेला दिसतो. आशाताईंनीही ही गाणी अशी गायली आहेत, की त्यांच्यासारखी अन्य कुणी गाऊ शकेल असं वाटतही नाही. दुर्दैवानं कालांतरानं आशाताई व नय्यर यांचे मतभेद झाले आणि त्यांनी एकत्र काम करणं बंद केलं. ‘चैन से हम को कभी’ या आशाताईंनी गायलेल्या अप्रतिम गीताला नय्यर यांचंच संगीत होतं. अनेक रसिकांना ते या जोडीचं ‘स्वान साँग’ किंवा भैरवी आहे, असं वाटतं. याच दशकात नय्यर यांच्याबरोबरीने एस. डी. बर्मन आणि रवी या संगीतकारांनीही आशाताईंना भरपूर संधी दिली. त्यांच्याकडून अनेक लोकप्रिय गाणी या काळात या दोन्ही संगीतकारांनी गाऊन घेतली.

पुढं १९६६ मध्ये आलेल्या ‘तिसरी मंजिल’ या चित्रपटानं आशाताईंच्या जीवनात आणखी एक वळण आणलं. संगीतकार आर. डी. बर्मन उर्फ पंचमदा त्यांच्या आयुष्यात आले. पंचमदांसोबत आशाताईंचे सूर सर्वार्थानं जुळले. अनेक उत्तमोत्तम आणि अवघड गाणी पंचम यांनी आशाताईंकडून गाऊन घेतली. ‘तिसरी मंजिल’मधल्याच ‘ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे’ या गाण्यापासून ते ‘इजाजत’मधल्या ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’पर्यंत किती गाणी सांगावीत!
‘तिसरी मंजिल’मधलं ‘आ आ आजा’ हे गाणं ऐकलं तेव्हा आशाताईंना आपण हे गाऊच शकणार नाही, असं वाटलं होतं. त्यांनी पंचमदांना तसं सांगितलं. त्यावर पंचमदांनी आपण ही चाल बदलू या, असं त्यांना सांगितलं. मात्र, नंतर आशाताईंनी हे एक आव्हान म्हणून घेतलं. त्यांचा स्वभाव तसाच होता आणि आहे. एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही म्हणजे काय, या विचारानं त्यांनी या गाण्याचा आठ दिवस सराव केला. एकदा तर त्या त्यांच्या गाडीत सराव करत असताना त्यांचा ड्रायव्हर म्हणाला, ‘ताई, काय होतंय तुम्हाला? श्वास लागतोय बहुतेक… गाडी ‘जसलोक’ला घेऊ का?’ आशाताईंचा ‘आ आ आ आ आ जा’ ऐकून ड्रायव्हर घाबरला होता. आशाताईंनीच एका मुलाखतीत त्यांच्या मिश्कील शैलीत हा किस्सा सांगितला आहे. पुढं पंचम आणि आशा यांनी त्यांच्या गाण्यांत अचाट प्रयोग केले. विशेषत: हेलन यांचं नृत्य आणि आशाताईंचा आवाज व पंचमचं दणकेबाज संगीत ही त्रयी चांगलीच लोकप्रिय झाली. मग ते ‘कारवाँ’मधलं ‘मोनिका ओ माय डार्लिंग, पिया तू अब तू आजा’ असो किंवा ‘डॉन’मधलं ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’ असो. आशाताईंनी सगळी कॅब्रे गाणी जोरदार गायिली आणि ती तुफान लोकप्रिय ठरली. असं म्हणतात, की हेलन स्वत: आशाताईंच्या रेकॉर्डिंगला उपस्थित राहायच्या आणि त्या कसं गात आहेत, याचं निरीक्षण करायच्या. त्यानुसार त्या त्यांच्यी नृत्याची रचना करायच्या. त्यामुळंच ती सगळी गाणी चांगलीच हिट झाली. ‘कटी पतंग’ या चित्रपटातलं ‘मेरा नाम है शब्बो’ हे गाणं म्हणजे तर कमाल आहे. या गाण्यात आशाताई रूढ अर्थानं गायलेल्या नाहीत. त्या केवळ गुणगुणल्यासारख्या गद्य ओळीच म्हणतात. त्याला पंचमची ‘हा हा हा हा हा’ची जोड…. यातून त्या प्रासंगिक गाण्यानं कमाल परिणाम साधला आहे. पंचम-आशा जोडीचीही अशी अनेक गाणी कमालीची लोकप्रिय ठरली. ‘चुरा लिया है दिल को जो तुमने’, ‘दो लफ्जों की है दिल की कहानी’, ‘एक मैं और एक तू’, ‘दम मारो दम’ अशी किती गाणी सांगावीत!
आशाताईंच्या आयुष्यात एक सुवर्णपर्व आलं ते ‘उमराव जान’ या चित्रपटाच्या निमित्तानं… या वेळी संगीतकार होते खय्याम. ‘उमराव जान’ची आशाताईंनी गायलेली सर्वच्या सर्व गाणी लोकप्रिय ठरली आणि त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कारही याच चित्रपटानं मिळवून दिला. या गाण्यांसाठी खय्याम यांनी आशाताईंना अर्धा नोट खाली गायला सांगितलं होतं. आशाताईंना स्वत:लाही विश्वास नव्हता, की त्या हाफ नोट खाली गाऊ शकतील का, म्हणून. मात्र, अखेर त्यांनी खय्याम यांचं ऐकलं आणि पुढचा सगळा इतिहास आहे. मूळ उमराव जान हिचा आवाज त्या पट्टीतला होता हे खय्याम यांना माहिती होतं. त्यामुळंच त्यांनी आशाताईंच्या गायनात हा बदल केला. ‘दिल चीज क्या है’, ’ये क्या जगह है दोस्तों’, ‘इन आँखो की मस्ती’, ‘जुस्तजू जिस की की…’ या सर्वच गाण्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. या चित्रपटामुळं आशा भोसले यांचं स्थान ‘एक चांगली, मेहनती गायिका’ यापासून ‘एक सर्वश्रेष्ठ, अभिजात गायिका’ या स्थानावर जे गेलं ते कायमचं. स्वत: आशाताईंनाही जणू त्या नव्यानं सापडल्या. ‘उमराव जान’ आला तेव्हा आशाताईंचं वय ४८ होतं. त्यांच्या आवाजातील परिपक्वता सर्वोच्च पातळीवर पोचली होती. इथून पुढची दोन दशकं आशाताईंनी त्यांच्या आवाजाचे विपुल प्रयोग करून रसिकांना अक्षरश: वेड लावलं. ‘उमराव जान’नंतर पाचच वर्षांत आला तो गुलजार यांचा ‘इज़ाज़त’! या चित्रपटातील ‘मेरा कुछ सामान’ आणि ‘कतरा कतरा मिलती है’ या दोन गाण्यांनी आशा-पंचम यांची जादू आपल्याला परत एकदा अनुभवता आली. आदल्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘जीवा’ या तुलनेत दुर्लक्षित चित्रपटातही ‘रोज रोज आँखो तले’ हे अप्रतिम गाणं आशाताई-पंचम जोडीनं दिलं होतं. यात आशाताईंचे सहगायक होते किशोरकुमार यांचे पुत्र अमितकुमार.
नव्वदच्या दशकातही आशाताईंनी आपला प्रभाव कायम ठेवला. १९९५ मध्ये आलेल्या ‘रंगीला’त त्यांनी ए. आर. रेहमानच्या संगीत दिग्दर्शनात निम्म्याहून कमी वयाच्या ऊर्मिला मातोंडकरला आवाज दिला. ‘याई रे याई रे जोर लगा के नाचे रे’ या आशाताईंच्या गाण्यानं तरुणाईला थिरकायला लावलं. ‘कंबख्त इश्क है ये’, ’जरा सा झूम लू मैं’, ‘किताबें बहुत सी पढी होंगी तुमने’ अशा किती तरी लोकप्रिय गाण्यांनी तेव्हा रसिकांना वेड लावलं. एकविसावं शतक उजाडल्यावरही चिरतरुण आशाताई वयानं किती तरी लहान नायिकांना पडद्यावर खणखणीत आवाज देत होत्या. ‘लगान’मध्ये ‘राधा कैसे ना जले’ गाण्यात आशाताईंनी बहार उडवून दिली होती. अगदी अलीकडं आलेल्या ‘बेगम जान’ चित्रपटातही त्यांनी ‘प्रेम में तोहरे’ हे गाणं गाऊन रसिकांना सुखद धक्का दिला होता. सतत काळाबरोबर राहण्याची हातोटी, नवनव्या गोष्टी शिकण्याची हौस, उत्तम विनोदबुद्धी आणि गाण्याचा ध्यास ही आशाताईंच्या सदासतेज व्यक्तिमत्त्वाची सहज जाणवणारी वैशिष्ट्यं.
ओ. पी. नय्यर, खय्याम आणि आर. डी. बर्मन या संगीतकारांचं आशाताईंच्या कलाजीवनात अनन्यसाधारण स्थान असलं, तरी इतर संगीतकारांसोबतही त्यांनी भरपूर काम केलं आणि अनेक अजरामर गाणी दिली. मदनमोहन आणि लता यांची जोडी प्रसिद्ध असली, तरी ‘मेरा साया’मधलं ‘झुमका गिरा रे बरेली की बजार में’ हे अतिशय लोकप्रिय गाणं मदनमोहन यांनी आशाताईंकडून गाऊन घेतलं. ‘शोख नजर की बिजलियाँ’, ‘कभी तेरा दामन ना छोडेंगे हम’, ‘जमीं से हमें आसमाँ पर…’, ‘आप को प्यार छुपाने की बुरी आदत है’ ही या जोडीची आणखी काही प्रसिद्ध गाणी. हेमंतकुमार यांनी ‘भँवरा बडा नादान हाय’सारखं अप्रतिम गाणं आशाताईंकडून गाऊन घेतलं.
शंकर-जयकिशन यांनीही आशाताईंकडून उत्तमोत्तम गाणी गाऊन घेतली. ‘परदे में रहने दो परदा ना हटाओ’ हे ‘शिकार’मधलं गाणं आजही लोकप्रिय आहे. याच गाण्यानं आशाताईंना दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. ‘अंदाज’मधलं ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ हे किशोरसोबतचं, तर ‘रात के हमसफर’ हे ‘ॲन इव्हिनिंग इन पॅरिस’मधलं रफीसोबतचं गाणं हीही शंकर-जयकिशन जोडीचीच गाणी. ‘आवाज दे के हमें तुम बुलाओ’, ‘नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठी में क्या है’ ही अशीच आणखी काही लोकप्रिय गीतं या जोडीनं दिली. लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीकडंही आशाताईंनी विपुल गाणी म्हटली, ‘लोफर’मधलं ‘कोई शहरी बाबू’, ‘अनहोनी’मधलं ‘हंगामा हो गया’, ‘हमजोली’मधलं ‘ढल गया दिन’ अशी किती तरी गाणी सांगता येतील. कल्याणजी-आनंदजी यांच्याकडे आशाताईंनी ‘डॉन’मधलं ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’, ‘विधाता’मधलं ‘उडीबाबा’ अशी उडत्या चालीची अनेक गाणी गायली. संगीतकार रवी यांच्याकडेही आशाताईंनी अनेक गाणी गायली. ‘दो बदन’मधलं ‘जब चली ठंडी हवा’, ‘ये रातें ये मौसम’, ‘आगे भी जाने ना तू’, ‘तोरा मन दर्पण कहलाए’, ‘मुझे गले से लगा लो’ अशी किती तरी गाणी या जोडीच्या नावावर जमा आहेत. बप्पी लाहिरी आणि आशाताई या जोडीने तर ‘डिस्को युगा’त आपल्या झिंगाट गाण्यांनी एकच धमाल उडवून दिली होती. ‘हिंमतवाला’मधलं ‘ताकी ओ ताकी’, ‘नमक हलाल’मधलं ‘आज रपट जाए’, ‘जवाने जानेमन’, ‘रात बाकी’ अशी किती तरी गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती. अजित वर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनात ‘विजेता’ या चित्रपटासाठी आशाताईंनी सत्यशील देशपांडे यांच्यासह गायलेलं ‘मन आनंद आनंद छायो’ हे अप्रतिम गाणं आजही रसिकांच्या लक्षात आहे.
आशाताईंनी बहुतेक सर्व मोठ्या पुरुष सहगायकांबरोबर गाणी गायली. मात्र, त्यांची विशेष जोडी जमली ती किशोरकुमारसोबत. किशोरच्या अवलिया व्यक्तिमत्त्वाला तोडीस तोड अशा आशाताई होत्या. त्यामुळे त्यांची गाणीही तशीच खुलून यायची. ‘सीएटी कॅट, कॅट माने बिल्ली’ किंवा ‘हाल कैसा है जनाब का…’, ‘छोड दो आँचल जमाना क्या कहेगा’, ‘ये रातें ये मौसम’, ‘भली भली सी इक सुरत’, ‘एक मैं और एक तू’ अशी किती तरी अवखळ, नटखट गाणी त्यांनी अगदी धमाल पद्धतीनं गायली. किशोरच्या यॉडलिंगला किंवा रेकॉर्डिंगच्या वेळी चालणाऱ्या दंग्याला आशाताई पुरून उरायच्या. त्यामुळं दोघांची केमिस्ट्रीही चांगली जुळली होती.
किशोरप्रमाणेच महंमद रफी यांच्यासह आशाताईंनी अनेक अजरामर गाणी दिली. ‘दिवाना हुआ बादल’, ‘अभी ना जाओ छोडकर’, ‘इशारों इशारों में’, ‘अच्छा जी मैं हारी चलो’, ‘ढल गया दिन’, ‘बहुत शुक्रिया बडी मेहेरबानी’, ‘आजा पंछी अकेला है’, ‘ये परदा हटा दो’, ‘गुनगुना रहे है भंवरे’, ‘हम तेरा इंतजार करेंगे कयामत तक’…. किती गाणी सांगावीत! मुकेश यांच्याबरोबरही अगदी सुरुवातीच्या काळात ‘पतली कमर है तिरछी नजर है’, ‘छोड गये बालम’, ‘जाने न नजर पहचाने जिगर’ अशी चांगली गाणी आशाताईंनी दिली.
मन्ना डे यांच्यासह आशाताईंनी अनेक गाणी गायली. सध्या पुन्हा गाजत असलेलं ‘ना तो कारवाँ की तलाश है’ हे मन्नादा आणि आशाताईंचंच ओरिजनल गाणं. ‘श्री ४२०’मधलं ‘मुड मुड के ना देख’ हेही आशा-मन्नादा जोडीचं सुपरहिट गाणं. याशिवाय ‘तू छुपी है कहाँ’, ‘दुख भरे दिन बीते रे भय्या’, ‘ये हवा, ये नदी, ये किनारा’, ‘धीरे धीरे चलना’ अशी अनेक लोकप्रिय गाणी या जोडीनं दिली. महेंद्र कपूर यांच्यासह आशाताईंनी ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ‘अरे जा रे नटखट’, ‘आजा आजा रे तुझको मेरा प्यार पुकारे’, ‘धडकने लगी दिल की तारों की दुनिया’, ‘चलो बुलावा आया है’ अशी किती तरी चांगली गाणी दिली आहेत. ही सर्व गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत.
पुरुष सहगायकांप्रमाणेच काही गायिकांबरोबरही आशाताईंनी सहगायन केलंय. त्यात अर्थातच लतादीदींबरोबर गायलेलं ‘उत्सव’मधलं ‘मन क्यूं बहका रे बहका’, शमशाद बेगम यांच्याबरोबरचं ‘लेके पहला पहला प्यार’, उषा मंगेशकरांसह गायलेलं ‘काहे तरसाये’ ही चटकन आठवणारी काही गाणी. 

आशाताईंनी हिंदीबरोबरच मराठीतही विपुल गाणी गायिली. मराठी चित्रपटसंगीतातलं एक लखलखतं दालन आशाताईंच्या नावानं आहे. त्यांची विशेष जोडी जमली ती संगीतकार सुधीर फडके यांच्यासह. ‘जगाच्या पाठीवर’ या अतिशय लोकप्रिय ठरलेल्या १९६० मधल्या मराठी चित्रपटात बाबूजी, गदिमा आणि आशा या त्रयीनं कमाल केली. यातली सगळीच गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. ‘बाई मी विकत घेतला श्याम’, ‘नाचनाचुनी अति मी दमले’, ‘तुला पाहते रे तुला पाहते’ ही आशाताईंची गाणी आजही तितकीच आवडीनं ऐकली जातात. ‘सुवासिनी’ या चित्रपटासाठी बाबूजींनी आशाताईंकडून गाऊन घेतलेलं ‘दिवसांमागुनी दिवस चालले, ऋतूमागुनी ऋतू’ हे गाणं म्हणजे तर एक चमत्कारच आहे. या दीर्घ गाण्यात प्रत्येक अंतऱ्यात बाबूजींनी वेगवेगळ्या रागात चाल बांधली आहे. हे गाणं म्हणणं आव्हानात्मक होतं. मात्र, आशाताईंनी ते सहज पेललं. बाबूजींकडून गाण्यातले शब्द, त्यांचे नेमके उच्चार, शिस्त या सगळ्या गोष्टी आशाताईंनी आत्मसात केल्या. या जोडीनं अनेक अवीट गोडीची युगुलगीतं दिली. ‘धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना’ हे तर त्यातलं मेरुमणी म्हणावं असं जगदीश खेबूडकरांचं गाणं. ‘चंद्र आहे साक्षीला’ हेही असंच अप्रतिम गाणं. ‘मुंबईचा जावई’मधलं ‘का रे दुरावा का रे अबोला’ हेही बाबूजी-आशा जोडीचं असंच एक प्रचंड लोकप्रिय गाणं. जरा नंतरच्या काळात, म्हणजे १९८५ मध्ये आलेल्या ‘शापित’मधलं ‘दिस जातील दिस येतील’ हे सुरेश वाडकरांसह गायलेलं गाणंही खूप गाजलं. नंतर १९८७ मध्ये आलेल्या ‘पुढचं पाऊल’ या चित्रपटातलं ‘एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी’ गाणं म्हणजे बाबूजी-आशाताई यांच्या गाण्यांतलं आणखी एक मानाचं पान. या गाण्याचं ऑर्केस्ट्रेशनही जबरदस्त आहे. बाबूजींच्या गाण्यांत सहसा पाहायला न मिळणारा मोठा वाद्यवृंद, व्हायोलिन्सचा ताफा यात दिसतो. आशाताईंनीही या गाण्याचं सोनं केलंय.
बाबूजींप्रमाणेच भाऊ पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह आशाताईंनी मराठीत अनेक उत्तमोत्तम गाणी दिली. यात चित्रपटगीतांबरोबरच भावगीतांचा समावेश होता. ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे’ हे हृदयनाथ मंगेशकरांनी आशाताईंकडून गाऊन घेतलेले गाणे आशाताईंच्या गायनकौशल्याची कसोटी पाहणारे होते. यात फारशी वाद्ये नाहीत. चालही अवघड. पं. हृदयनाथांच्या चाली ऐकायला सोप्या, पण गायला अतिशय अवघड, असं आशाताई आणि लतादीदी नेहमी म्हणत. ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘मी मज हरपुन बसले गं’ ही सुरेश भटांची, ‘गेले द्यायचे राहुनी’, ‘समईच्या शुभ्र कळ्या’ ही आरती प्रभूंची, ‘चांदणे शिंपीत जाशी’ हे राजा बढेंचं आणि ‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती’ ही संत ज्ञानेश्वर माउलींची अशा वैविध्यपूर्ण रचना पंडितजींनी आपल्या मोठ्या बहिणीकडून गाऊन घेतल्या. चित्रपट संगीतात ‘जैत रे जैत’मधली गाणी कोण विसरू शकेल? ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ हे तर अगदी भरपूर लोकप्रिय झालेलं गाणं आशाताईंनी अत्यंत ठसक्यात म्हटलंय. याशिवाय ‘नभ उतरू आलं… चिंब थर्थर वल्लं’ हे गाणंही आशाताईंच्या अफाट गायकीचा प्रत्यय देणारं आहे. याच चित्रपटात ‘कोण्या राजानं राजानं’ हे गाणं आशाताईंनी त्यांची कन्या वर्षा हिच्यासह म्हटलं आहे. या दोघींना एकत्र ऐकण्याचा दुर्मीळ अनुभव हे गाणं आपल्याला देतं.
आशाताईंनी १९७० मध्ये आलेल्या ‘घरकुल’ या चित्रपटात सी. रामचंद्र यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे’ हे सुरेश भटांचं अफाट रोमँटिक गाणं गायलं आहे. हे गाणं आजही तितकंच टवटवीत आणि कमाल वाटतं. राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आशाताईंनी अनेक लावण्या गायल्या. अर्थात आशाताई आणि लावण्या या प्रवासाची सुरुवात १९५९ मध्ये आलेल्या ‘सांगत्ये ऐका’मधल्या वसंत पवार यांच्या संगीतातल्या ‘हाय, बुगडी माझी सांडली गं’पासून झाली होती. आशाताईंच्या त्या ‘हाय’वर अनेक जीव आजही फिदा आहेत. आनंदघन अर्थात लतादीदींनीही आशाताईंकडून ‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी’ ही लावणी गाऊन घेतली होती. राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनात आशाताईंनी ‘सुगंधी कट्टा’ या चित्रपटात गायलेली अनेक गाणी गाजली. ‘नाचू किती नाचू किती कंबर लचकली’, ‘तीळगूळ घ्या हो गोड गोड बोला’ ही गाणी आजही रसिकांना प्रिय आहेत. विश्वनाथ मोरे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आशाताई आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं ‘गंध फुलांचा गेला सांगून’ हे ‘भालू’मधलं सुंदर गाणं कोण विसरू शकेल?
आशाताईंच्या मराठीतल्या गाण्यांची रेंज खरोखरच थक्क करणारी आहे. पुलंनी संगीत दिलेल्या ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’ या गाण्यापासून ते ‘गोरी गोरी पान फुलांसारखी छान’ किंवा ‘तुझ्या गळ्या माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा’ ही गाणी ते ‘बाई मी पतंग उडवीत होते’ किंवा ‘कुठं कुठं जायाचं हनीमूनला’पर्यंत अनेक वैविध्यपूर्ण गाणी आशाताईंनी गायिली आहेत. पिढ्यांमागून पिढ्यांचे कान तृप्त केले आहेत. बाबूजींचे चिरंजीव श्रीधर फडके यांच्यासह केलेला ‘ऋतू हिरवा’ हा नव्वदच्या दशकात आलेला भावगीतांचा अल्बमही रसिकांनी डोक्यावर घेतला. यातलं ‘सांज ये गोकुळी’ हे गाणं पुढं ‘वजीर’ चित्रपटात घेण्यात आलं. याच अल्बममधलं ‘भोगले जे दु:ख त्याला’ ही भटांची गज़ल म्हणजे तर आशाताईंचं स्वगत म्हणावं असंच आहे. अगदी हीच भावना ‘हम दोनो’मधलं ’जहाँ में ऐसा कौन है जिस को गम मिला नहीं‘ हे आशाताईंचं गाणं ऐकताना मनात येते.
मराठीप्रमाणेच हिंदीतही आशाताईंच्या गैरफिल्मी गाण्यांचं प्रमाण आणि त्याची लोकप्रियता थक्क करणारी आहे. गुलाम अलींसोबत त्यांनी केलेला ‘मिराज-ए-गज़ल’ हा अल्बम खूप गाजला. यातलं ‘सलोना सा सजन है और मैं हूँ’ हे गाणं आजही अतिशय लोकप्रिय आहे. आशाताईंना खूप लहानपणापासून चांगल्या नकला करता यायच्या. त्यांना अगदी लहान वयात काही पाश्चात्त्य गायक आणि गायिकांची गाणी ऐकायला मिळाली. आशाताईंनी तो ढंग आपल्या गायकीत आणला. पुढं आर. डी. बर्मन यांनी तर त्यांच्या या गुणाचा खूपच उपयोग करून घेतला आणि अतिशय वेगळ्या चालीची, ढंगाची गाणी दिली. ‘अलिबाबा और चालिस चोर’मधलं ‘खतूबा खतूबा’ हे आशाताईंनी अरबी ढंगात गायलेलं गाणं याचं एक उदाहरण म्हणून सांगता येईल.
आशाताई आज ९२ वर्षांच्या आहेत. आयुष्य भरभरून जगल्या आहेत. अगदी अलीकडं ‘माई’ या चित्रपटात त्यांनी अल्झायमर असलेल्या वयस्कर स्त्रीची भूमिका केली होती. पाश्चात्त्य गायकांसोबत गाण्यांचे वेगवेगळे प्रयोग त्या करत असतात. क्रिकेटपटू ब्रेट लीबरोबर २००६ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आदी त्यांनी ‘यू आर द वन फॉर मी’ हे गाणंही गायलं होतं.
खरं तर त्यांच्या कारकिर्दीतल्या सर्व गाण्यांचा वा त्यांच्या आयुष्यातल्या सर्व घटनांचा आढावा या कार्यक्रमात घेणं अशक्यच आहे. आशाताईंना अनेक पुरस्कार मिळाले. दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मविभूषण’ही त्यांना मिळालेला आहे आणि अर्थातच चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अजोड योगदानाबद्दल त्यांना २००१ मध्ये सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. एका मुलाखतीत आशाताई म्हणाल्या होत्या, ‘मीही तुमच्यासारखीच एक सर्वसामान्य स्त्री आहे. मीही भाजी आणायला जाते, मुलांचा डबा करते. स्वयंपाक करायला मला फार आवडतं. सणवार करायला आवडतात. खरेदी करायला आवडते, साड्या विकत घ्यायला आवडतात. फक्त हा जो गळा आहे तिथं देवानं जे काही ठेवलं आहे, तेवढाच आपल्यात फरक आहे. बाकी मला तुमच्यातलीच समजा…’
आशा भोसले हे काय रसायन आहे हे यावरून कळतं. व्यक्ती म्हणून तर त्या श्रेष्ठ आहेतच; पण त्यांच्या अद्भुत, अलौकिक सूरांचं गारूड या सर्वांपलीकडं आहे. आशाताई, तुमच्या संपूर्ण जीवनाकडं पाहूनच बरंच काही शिकण्यासारखं आहे. तुमच्या अलौकिक आवाजाला, जिद्दीला, मेहनतीला, विनोदबुद्धीला आणि झुंजार वृत्तीला आमचा मानाचा मुजरा!

----

हा कार्यक्रम ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

----

रूपेरी पडद्याचे मानकरी - लता मंगेशकर हा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-----

3 Feb 2026

पुण्यभूषण दिवाळी अंक २५ - लेख

चटकदार चवीची लज्जतदार भेळ
---------------------------------------

भेळ आवडत नाही असा माणूस भेटणं कठीण. लहान-थोर, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत अशा सर्व भेदांपलीकडे जाऊन भेळ बहुतेक सर्वांना आवडतेच. करायला म्हटलं तर सोपी. तिची एकच एक अशी काही स्टँडर्ड रेसिपी नाही. त्यामुळं कुणालाही करायला सोपी वाटणारी. ती तयार करायला लागणारे सगळे घटकही मिळणं अवघड नाही. संध्याकाळचं चटक-मटक खाणं म्हणजे भेळ हे आजही अनेकांसाठी अभेद्य असं समीकरण आहे. भेळेत दोन मुख्य प्रकार. एक म्हणजे सुकी व दुसरा म्हणजे ओली. ओल्या भेळेला जरा तरी जामानिमा असतो. त्या मानाने सुकी भेळ अगदी कधीही, कुठेही तयार होऊ शकेल अशी. चुरमुरे, फरसाण, शेंगदाणे, बारीक शेव, कांदा, तळलेली वा कच्ची मिरची, असल्यास टोमॅटो व कोथिंबीर आणि वरून थोडंसं तिखट-मीठ घातलं की झाली सुकी भेळ तयार. ही शक्यतो वर्तमानपत्राच्या मोठ्या कागदावर ढीग करून खायची. शिवाय शक्यतो एकट्याने न खाता, समूहाने खायची. पूर्वी तर अनेक सार्वजनिक कार्यक्रमांनंतर कार्यकर्ते मंडळींचा हाच आहार असायचा. त्याला भत्ता असं म्हटलं जात असे. भेळभत्ता असा मूळ शब्द. नंतर त्याचं लघुरूप ‘भत्ता’ हेच प्रचलित झालं. राजकीय सभा, गणेशोत्सव, बैठका अशा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी उपस्थित सर्वांना एकत्र खायला देण्यासारखा (व अर्थात परवडणारा) हाच पदार्थ असल्यानं तो अतिशय लोकप्रिय आहे. अगदी लहान-मोठ्या सहली, गेटटुगेदर, ऑफिसमधल्या अचानक ठरणाऱ्या पार्ट्या आणि दुपारच्या वेळेला मुलांना खायला काय द्यावे या विवंचनेत असणाऱ्या आया या सर्व ठिकाणी उपयुक्त ठरते ती ही सुकी भेळ किंवा भत्ता. महाराष्ट्रातल्या विविध शहरांत-गावांत या भत्त्याची वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात. डाव्या आघाडीच्या किंवा कामगार संघटनांच्या बैठकांत अशा भत्त्यात ‘लेनिन मिक्श्चर’ हा प्रकार लोकप्रिय होता. याचं मूळ आंध्र प्रदेशात आहे. विजयवाडा येथून हे ‘लेनिन मिक्श्चर’ प्रसिद्ध झालं. भत्त्यासारखाच प्रकार, पण आंध्रात यात तळलेले दाणे, मसाले असं बंरच काय काय मिक्स करतात. सत्तरच्या दशकात मुंबईत गिरणी कामगार, त्यांच्या बैठका, कामगार संघटना, डाव्यांच्या संघटना यांतून हा प्रकार अधिक बघायला मिळे. निवडक मराठी साहित्यिकांच्या लेखनात याचा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रात नाशिक, सांगली-मिरज, पंढरपूर आदी ठिकाणचे अनुक्रमे चिवडा, भडंग व मुरमुरे राज्यभर प्रसिद्ध असल्याने तेथील भेळेत स्वाभाविकच या पदार्थांचा मुबलक वापर व्हायला लागला. किंबहुना त्या त्या शहराची ती खासियत ठरली.
ओली भेळ हा जास्त करून बागेत जाऊन खाण्याचा प्रकार. रेसिपी सुक्या भेळेसारखीच, फक्त यात चिंचेचे, पुदिन्याचे, मिरचीचे असे मिश्र पाणी घालून ती भेळ ओली केली जाते. हे घटक कसे मिळून येतात आणि ते पाणी काय चवीचं तयार होतं, यावर त्या त्या भेळेची चव ठरते. मुंबईतील चौपाटीवरची भेळ सर्व राज्यात सर्वाधिक प्रसिद्ध आहे. पु. ल. देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे, अशा ठिकाणी खाताना स्वच्छतेचे इंद्रिय आवरावे लागते. किंबहुना भे‌ळवाल्याच्या कळकटपणाच्या चढत्या श्रेणीत भेळेची चव रंगते. मुंबईत या भेळेसोबत पुरी दिली जाते. त्या पुरीनेच ती भेळ खाणे अपेक्षित असते.
मुंबईत जशी चौपाटी तशी पुण्यात सारसबाग, शनिवारवाडा आणि कमिशनर ऑफिस येथील ‘चौपाट्या’ पूर्वीपासून प्रसिद्ध होत्या. महाराष्ट्रात इतरत्र जी भेळ मिळते त्यात प्रामुख्याने फरसाण हा बेस असतो. पुणेरी भेळेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे चुरमुरे हा बेस असतो. त्यामुळ‌े पुण्याबाहेरच्या भेळी काहीशा तिखट आणि झणझणीत असतात. मात्र, पुण्यातील भेळ चवीला चटकदार असली, तरी न बाधणारी, सौम्य अशी असते. मुरमुऱ्यांसोबत पापडी, भावनगरी शेव, एक नंबर (बारीक) शेव, गाठी, खारेदाणे, तिखट बुंदी, काळे मीठ, मिरचीचा ठेचा, चिंच-खजुराची चटणी, वर कांदा-टोमॅटो हे सगळं मिश्रण मोठ्या पातेल्यात एकजीव करायचं, त्यावर पुन्हा बारीक शेव, कोथिंबीर, कांदा, ग्राहकाने मागितल्यास पुन्हा थोडी चिंचेची चटणी, सीझन असेल तर कैरीच्या फोडी अशी साधारण भेळ तयार करण्याची इथली पद्धत.
मी ३०-३५ वर्षांपूर्वी पुण्यात आलो, तेव्हा सर्वांत प्रथम सारसबागेसमोरच भेळ खाल्ली होती. त्यानंतर पुण्यातच वास्तव्य झालं. त्यानंतर अनेकदा, अनेक ठिकाणची भेळ खाल्ली. ‘सकाळ’मध्ये काम करताना शनिवारवाड्यासमोरची चौपाटी हा आमचा रात्रीच्या जेवणाऐवजीचा हक्काचा पर्याय असायचा. तेव्हा शनिवारवाड्यासमोर मोकळं मैदान होतं. आता समोर दगडी भिंत घातली आहे, ती नव्हती. तिथं रस्त्याच्या कडेलाच ओळीनं भेळेच्या, आइस्क्रीमच्या, खाऊच्या गाड्या लागलेल्या असत. जवळपास राहणारी पुणेकर मंडळी तिथं रात्री फिरायला येत. आम्हाला काम संपवून बाहेर पडायला अनेकदा उशीर होई. तोवर हॉटेलं बंद होत आलेली असत आणि खरं सांगायचं तर रोज हॉटेलमध्ये जाऊन खाणं परवडायचंही नाही. मग शनिवारवाड्यासमोरची ही चौपाटी मदतीला यायची. मी व माझे सहकारी चालत तिथं जात असू आणि तेव्हा पाच की दहा रुपयांना मिळणाऱ्या भेळेत रात्रीचं जेवण भागवत असू. तिथल्या भेळेच्या गाड्यांची नावं आता फार लक्षात नाहीत. पण एक ‘नवरत्न’ नावाची भेळ बऱ्यापैकी प्रसिद्ध होती. अर्थात तेव्हा भूक भागवणं हाच मुख्य हेतू असल्यानं भेळ किती चवीष्ट आहे की नाही वगैरे फारसं बघितलं जायचं नाही. मात्र, या सर्व भेळेच्या गाड्यांवर तेव्हाही भरभरून गर्दी व्हायची. एक पथ्य मात्र आम्ही आवर्जून पाळायचो. ते म्हणजे गणपतीच्या काळात बाहेर, रस्त्यावर ही भेळ खायची नाही! (किंवा खरं तर काहीच खायचं नाही.) त्या काळात त्या भेळेची चव पार बिघडलेली असायची. (मला वाटतं, फक्त गणपतीच्या काळात पुण्यात येऊन ही असली भेळ खाऊन मगच बाहेरचे लोक पुण्यात चांगली भेळ मिळत नाही, असं म्हणत असावेत.)
शनिवारवाड्याप्रमाणेच स्वारगेट बस स्टँडवर अगदी मध्यरात्रीही एक भेळेचा गाडा सुरू असायचा. स्थानकाच्या अगदी आत, स्वारगेट डेपोच्या बाजूला तो गाडा उभा असायचा. आम्ही कित्येकदा ऑफिस संपवून रात्री दीड-दोन वाजता तिथं जाऊन भेळ खाल्ली आहे. त्या भेळेच्या गाड्याचं नाव मात्र आता विसरलो. त्या भेळेची चव व त्यासोबत सहकाऱ्यांसोबत विविध विषयांवर झोडलेल्या मनसोक्त गप्पा मात्र आजही लक्षात आहेत. पूर्वी शिवाजीनगर रेल्वेस्थानकाजवळची झटका भेळ प्रसिद्ध होती. ही मी कधी चाखली नाही, मात्र ती खूप प्रसिद्ध होती, असं ऐकलं आहे. हे मालक म्हणे भेळ तयार करताना मानेला झटका द्यायचे म्हणून ते नाव! (हे असं नाव ठेवणं पुण्याच्या तेव्हाच्या प्रकृतीला अगदी साजेसंच...) सिटीपोस्टाजवळची अण्णांची भेळ अशीच प्रसिद्ध होती. इथं उकडलेला बटाटा घालून भेळ मिळायची. नेहमीच्या ग्राहकांशी वर गप्पांची मैफलही इथं रंगायची. अपोलो टॉकीजजवळच्या ‘इंटरव्हल’ या भेळेविषयीही फक्त ऐकलं आहे. कधी जाण्याचा योग आला नाही. तिथं प्रत्येक टेबलावर चिंचेच्या पाण्याचा तांब्या व तिखट चटणीची वाटी ठेवलेली असते म्हणे. शौकिनांनी आपल्याला हवी तशी चव तयार करून घ्यावी. लाल भडंग भेळ ही त्यांची खासियत. जंगली महाराज रस्त्यावरून झेड ब्रिजकडं वळताना आता तिथं दोन्ही बाजूंना मोठी खाऊ गल्ली विकसित झाली आहे. पूर्वी तिथं अगदी मोजक्या भेळेच्या गाड्या असायच्या. तिथली सांगली भडंग भेळ खूप प्रसिद्ध आहे. याशिवाय आर डेक्कन मॉलच्या खाली यशवंत कच्छी दाबेलीच्या शेजारी सोनाक्षी या नावाचा भेळेचा गाडा लागतो. त्यांचीही भेळ, पाणीपुरी, शेवपुरी असं सगळं चांगलं असतं.
याशिवाय तेव्हाचे आमच्या आवडीचे आणखी एक ठिकाण होते ते म्हणजे फरासखान्यासमोरचे ‘रामचंद्र भगवंत घाटगे चिवडेवाले’ यांच्याकडची कोरडी भेळ. खरं तर तो चिवडाच. मात्र, त्यात सुक्या भेळेतील सर्व घटक असायचे. अनिल अवचट यांनी या चिवडेवाल्यांवर लेख लिहिल्यामुळे ते खूपच प्रसिद्ध झाले. पायजमा, पांढरा शर्ट, गांधी टोपी अशा वेषातील ते घाटगेकाका मला आजही आठवतात. कुणी जादा लिंबू किंवा मिरची मागितली, की ते जरा वैतागायचे. ‘आम्ही करून दिलेलं मिश्रण सर्वोत्तम असून, तुम्ही ती चव बिघडवू नका,’ असंच त्यांचं सांगणं असायचं. त्यांचे नेहमीचे ग्राहक त्यामुळे कधीही जादा लिंबू, कांदा वा मिरची मागायचे नाहीत. अतिशय अप्रतिम असा हा चिवडा असायचा. इथंच अगदी जवळ जोगेश्वरीच्या बोळातील प्रवीण भेळही अतिशय जुनी व प्रसिद्ध आहे.
पूर्वी चौपाटीव्यतिरिक्त पुण्यात निव्वळ भेळेची म्हणून काही दुकानं अतिशय प्रसिद्ध होती. गुप्ता भेळ, मंडईजवळची लता भेळ, पासोड्या विठोबाजवळची नानाची भेळ, सोन्या मारुती चौकातील मारुती भेळ, लोखंडी तालमीसमोरचा (बहुतेक गजानन) भेळवाला, पुष्करिणी भेळ हे मध्य वस्तीतले असेच प्रसिद्ध भेळवाले. यांच्या पुणेरीपणाचे किस्सेही बहुतेकांना माहिती आहेत. लोखंडे तालमीचा गणपती बसतो, तिथं अगदी समोर एका अगदी चिंचोळ्या जागेत हे भेळवाले उभे राहायचे. तिरक्या भिंतीमुळे त्रिकोणी आकार तयार झाला होता तिथं. संध्याकाळी पाच वाजता तिथलं शटर वर करून ते भेळेचं दुकान सुरू करायचे. त्यांच्या भेळेची ख्याती बऱ्यापैकी होती. त्यामुळं लोक उभे राहून,  वाट बघून ती भेळ खात असत. त्या दुकानाचं नाव बहुतेक गजानन भेळ असावं. आता मला नीटसं लक्षात नाही; मात्र लक्षात आहे तो अतिशय भरभर चालणारा त्यांचा हात. अगदी थोड्या वेळात त्या भल्यामोठ्या स्टीलच्या भांड्यात ते भेळ तयार करत असत. ग्राहकांच्या गर्दीमुळे तो एकटा माणूस अनेकदा वैतागून जाई आणि लोकांवर ओरडे. मात्र, लोक तरीही तो ओरडा ऐकून घेऊनही ती भेळ खायला तिथं थांबत.

अशीच दुसरी प्रसिद्ध पुणेरी भेळ म्हणजे सदाशिव पेठेतली पुष्करिणी भेळ. कुमठेकर रोडवरील बिझीलँड बिल्डिंगमधील ही भेळ अतिशय लोकप्रिय आहे. प्रभाकर वासुदेव मेंगणे यांनी १९२५ मध्ये या भेळेची सुरुवात केली. म्हणजेच सध्या या भेळेच्या दुकानाची जन्मशताब्दी सुरू आहे. सुरुवातीला बाजीराव रोडवर ‘बँक ऑफ महाराष्ट्र’जवळ हे दुकान होतं. तिथं पूर्वी एक पुष्करिणी (हौद) असल्यामुळं दुकानाचं नावही त्यांनी ‘पुष्करिणी’ असंच ठेवलं. नंतर १९३५ मध्ये ते आताच्या जागेत गेलं व अजूनही ते तिथंच आहे. मुरमुरे, शेव, चिवडा वा फरसाण आणि चटणी हे कुठल्याही भेळ‌ेचं मूलभूत साहित्य. ‘पुष्करिणी’मध्ये हे सर्व घटक तर असतातच; शिवाय इथं लाल तिखट आणि चिंच व गुळाची चटणीही वापरली जाते. त्यामुळंच इतर भेळेपेक्षा ही भेळ अधिक चटकदार लागते. इथं एका वेळी खूप जास्त भेळ करून ठेवायची पद्धत नाही. सर्व घटकांचा कुरकुरीतपणा, ताजेपणा कायम राहावा, हाच त्यामागचा हेतू असतो. (त्यामुळं इथं वेटिंग असतं कायम!) ‘पुष्करिणी’त फरसाण, चिवडा व इतर सर्व पदार्थ स्थानिक बाजारपेठेतून व विश्वासाच्या पुरवठादारांकडूनच घेतले जातात. शेव व शेंगदाणे ताजे मिळावेत यासाठी रोज सकाळी दुकानातच शेव तळली जाते व शेंगदाणे भाजले जातात.
प्रभाकर मेंगणे यांचे नातू नित्यानंद सध्या दुकान सांभाळतात. ते आणि आणखी एक व्यवस्थापक एवढे दोघेच जण दुकानात असतात. आजूबाजूला लक्ष्मी रोड, शनिवार, मंडई, तुळशीबाग इथं खरेदी करून झाली, की बहुतेक पुणेकर इथली भेळ खायला येतातच. साधारण संध्याकाळी साडेचार वाजता दुकान उघडतं. भेळ संपेपर्यंत म्हणजे साधारण आठ-साडेआठपर्यंत ते सुरू राहतं. वेटिंग असलं, तरी सर्वांना ताजी व दर्जेदार भेळ देण्याकडं मालकांचा कटाक्ष असतो. इथल्या पाट्या हाही अनेकदा चर्चेचा विषय असतो. एकूण, अस्सल पुणेरी परंपरेतील अशी ही भेळ आहे. 

बिबवेवाडीत सुरू झालेली कल्याण भेळ म्हणजे लहान गोष्टींपासून सुरुवात करून यशाचे शिखर कसे गाठता येते याचे उत्तम उदाहरण आहे. रमेशभाऊ कोंढरे यांनी १९७४ मध्ये सुरू केलेल्या ‘कल्याण भे‌ळ’ या अन्न उद्योगाचा प्रसार आता अनेक शाखा आणि परदेशांत भेळ निर्यात करण्यापर्यंत झाला आहे. गरिबीमुळे रमेशभाऊ व त्यांचे वडील मार्केट यार्डात हमाल म्हणून काम करत असत. गरिबीमुळं चौथ्या इयत्तेतच रमेशभाऊंचं शिक्षण थांबलं. गुळाच्या ढेपा पोत्यात भरण्यापासून ते भाजी विकण्यापर्यंत सर्व व्यवसाय त्यांचं कुटुंब करत होतं. त्याच सुमारास, म्हणजे १९७४ मध्ये रमेशभाऊंच्या आईने बिबवेवाडीतील कल्याण सोसायटीच्या बाहेर शाळेतील मुलांना भेळ करून द्यायला सुरुवात केली. भेळेतील चटणी करण्याची त्यांची स्वत:ची एक खास पद्धत होती. यामुळं त्यांची भेळ मुलांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झाली. हळूहळू रमेशभाऊंनी ग्राहकांच्या प्रतिसादावरून अंदाज घेत नवनव्या डिशेस सुरू केल्या आणि या व्यवसायाचा विस्तार केला. अगदी सुरुवातीला भेळेची छोटी गाडी होती. तिथपासून आताच्या भव्य दुकानापर्यंत या भेळेच्या उद्योगाचा विस्तार कोंढरे कुटुंबीयांनी केला आहे. पुण्यात आता आठ शाखा आणि तब्बल ३८ देशांना निर्यात एवढा या व्यवसायाचा व्याप आता वाढला आहे. 

कल्याण भेळेप्रमाणेच पुण्यातील भेळेचा आणखी एक प्रसिद्ध ब्रँड म्हणजे गणेश भेळ. दिनेश गुडमेवार व त्यांचे बंधू हे या ब्रँडचे संचालक आहेत. ते मूळचे नांदेडचे. लहानपणी ते पुण्यात त्यांच्या मामाकडे येत असत. नंतर ते शाळा सोडून मामाकडेच आले व त्यांना लहान-मोठ्या कामांत मदत करू लागले. त्यांनी १९७८ मध्ये पुण्यात भेळेची एक लहान गाडी सुरू केली. त्यानंतर सुमारे २० वर्षे त्यांनी या गाडीवरूनच भेळविक्रीचा व्यवसाय केला. त्यानंतर १९९८ मध्ये कर्वेनगरमध्ये त्यांच्या वडिलांनी पहिल्यांदा गणेश भेळ या नावाने दुकान सुरू केले. त्यानंतर दोनच वर्षांत एकाची तीन दुकाने झाली. आता पुण्यात त्यांची एकूण १३ दुकाने आहेत. त्यांनी भेळेच्या व्यवसायाला कॉर्पोरेट रूप दिले. अनेक फ्रँचायझी, यंत्रांवर निर्मिती, निर्यात अशा सर्व आघाड्यांवर गणेश भेळ हा ब्रँड आता नावलौकिक टिकवून आहे. भेळेप्रमाणेच इथं चाटचे सर्व पदार्थ मिळतात आणि त्या प्रत्येक पदार्थाचं ब्रँडिंग करण्यात ‘गणेश भेळ’चे मालक यशस्वी झाले आहेत. इथल्या पदार्थांचा दर्जा आवर्जून जपला जातो. इथले कामगार अगदी पंचतारांकित हॉटेलमध्ये असतात त्याप्रमाणे केस बांधून वगैरे डिश सर्व्ह करत असतात. बहुतेक घटक पदार्थ आता कारखान्यांत यंत्रांद्वारे तयार केले जातात. पाणीपुरीसारखा पदार्थ आरोग्यदायीच असावा, यासाठी तिथं मिनरल वॉटर वापरलं जातं. हे सर्व असताना इथले पदार्थ थोडेसे महाग वाटू शकतील. मात्र, चांगल्या दर्जासाठी दाम मोजणारे ग्राहक आपल्याकडे आता विपुल आहेत. त्यांना या भेळ‌ेच्या ब्रँडचे पदार्थ निश्चितच आवडतात.
गणेश भेळेप्रमाणेच आणखी एक लोकप्रिय नाव म्हणजे कैलास भेळ. यांचं मूळ ठिकाण खरं तर पुण्यात नाही. पुण्याहून साताऱ्याला जाताना खेड शिवापूर हे गाव लागतं. इथं खूप वर्षांपासून कैलास भेळ विकली जाते. आता या महामार्गावर तुम्हाला अनेक ‘कैलास भेळ’ दिसतील. अगदी एखाद्या लहान मॉलसारखी वाटतील, एवढी भव्य भेळेची दुकानं आता तिथं तयार झाली आहेत. किसन मिठारे, कैलास मिठारे, सुभाष मिठारे व अशोक मिठारे यांनी १९७५ मध्ये शिवापूरमध्ये भेळेचं लहानसं दुकान सुरू केलं. इथल्या स्वादिष्ट, चटकदार भेळेमुळं लवकरच कैलास भेळ हे नाव पुणे-सातारा महामार्गानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांत लोकप्रिय झालं. सध्याच्या ‘कैलास भेळ’ या ब्रँडचे मालक शिवराज मिठारे यांनी हा व्यवसाय नव्या उंचीवर नेला. पुण्याबाहेरही हा ब्रँड लोकप्रिय झाला पाहिजे, या विचाराने त्यांनी व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला. आज या भेळेचे आकर्षक वेष्टन परदेशांतही निर्यात केले जाते. पुणे-सातारा महामार्गावर वरवे येथे ‘कैलास भेळ’चे मोठे विक्री केंद्र व उपाहारगृह दिसेल. आता तिथं केवळ भेळच नव्हे, तर एखाद्या उपाहारगृहात मिळतात, ते सर्व पदार्थ दिले जातात. त्यातही पिठलं-भाकरी हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. एका छोट्या दुकानापासून सुरू होऊन एका मोठ्या कंपनीपर्यंतचा हा ‘कैलास’चा पदार्थ प्रेरणादायीच आहे. मराठी माणूस व्यवसायात दिसत नाही किंवा मागे पडतो, या समजुतींना छेद देणारेच हे सर्व भेळ उद्योजक आहेत, असे म्हणता येईल.
शिवाजीनगर भागातील गुप्ता भेळ हीदेखील पुण्यातील एक प्रसिद्ध भेळ. आता सुमारे ८३ वर्षांपासून ही भेळ पुणेकरांच्या सेवेत आहे. आता गुप्तांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. सुरुवातीला अगदी छोट्या फेरीवाल्या गाड्यापासून सुरुवात झालेल्या या भेळ व्यवसायाने आता चांगलेच मूळ धरले आहे. गुप्ता भेळ येथे साधारणपणे तीन प्रकारच्या भेळ मिळतात. पहिल्या प्रकारात साधी, सुकी भेळ मिळते. यात फरसाण, मुरमुरे एवढंच असतं. दुसरी म्हणजे ओली भेळ. यात चिंचेचं पाणी, कांदा, लाल तिखट टाकून ओली भेळ तयार केली जाते. तिसरी म्हणजे मटकी भेळ. यात मटकीमुळं भेळेचा स्वाद वाढतो. गुप्ता बंधू भेळेसाठी लागणारे फरसाण स्वत: कारखान्यात तयार करतात. शेवेचे वेगवेगळे प्रकारही तयार केले जातात. छत्रपती शिवाजीमहाराज रस्त्यावर असलेलं हे दुकान सकाळी आठ वाजता सुरू होते. ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू असतं. मग पुन्हा चारनंतर सुरू होतं आणि संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू राहतं. उत्तम दर्जामुळं अगदी लांबून लांबून ही भेळ खाण्यासाठी लोक येतात, असा गुप्ता बंधूंचा अनुभव आहे.
मुंढवा (केशवनगर) येथील जय गणेश भेळ हा ब्रँडही अतिशय लोकप्रिय आहे. संजय माने यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ भेळेचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. गेल्या १८ वर्षांपासून त्यांनी हा व्यवसाय यशस्वीपणे उभारला आहे. सुरुवातीला केवळ भेळ व पाणीपुरी होती. कालानंतराने त्यांनी मटकी भेळ, रगडापुरी, दहीपुरी असे पदार्थही विक्रीसाठी ठेवले. मोठ्या ब्रँडची मोठी दुकाने आसपास होती. स्पर्धाही खूप होती. मात्र, चिकाटी, मेहनत, स्पर्धेत टिकण्यासाठी केलेला अभ्यास या सर्व गुणांमुळे माने यांचा हा ब्रँड चांगला यशस्वी झाला आहे.
पुण्यातील बहुतेक बागांजवळ भेळेची दुकाने आहेतच. छत्रपती संभाजी उद्यान हे जंगली महाराज रस्त्यावरचं आणि पुण्यातलं एक महत्त्वाचं उद्यान. या उद्यानात असलेल्या ‘पूनम भेळ’ या प्रसिद्ध दुकानाचे सध्या अमृतमहोत्सवी वर्ष सुरू आहे. खरं तर अलीकडच्या काळात संभाजी उद्यानाची रया गेल्यासारखी स्थिती आहे. जंगली महाराज रस्त्यावर आणि एकूणच पुण्यात फूड जॉइंट्स वाढल्यामुळे संभाजी उद्यानातील अनेक फूड स्टॉल एक तर कमी झाले आहेत किंवा तिथे येणाऱ्यांची संख्या तरी घटली आहे. मात्र, पूनम भेळ अद्यापही पूर्वीच्याच थाटात ग्राहकांना सेवा देत आहे. फावडे कुटुंबाच्या मालकीच्या या दुकानाची जबाबदारी आता तिसऱ्या पिढीकडे आली आहे. पुण्याचे तत्कालीन मनपा आयुक्त स. गो. बर्वे यांनी नाशिकहून बोलावून घेतल्याने फावडे कुटुंब पुण्यात आले, असे परशुराम फावडे सांगतात. फावडे यांचे आजोबा बाबूराव फावडे नाशिकमध्ये चिवडा विक्रीचा व्यवसाय करत असत. हा चिवडा अतिशय आवडल्याने बर्वे यांनी फावडे कुटुंबास पुण्यात व्यवसाय करण्यास बोलावले. तेव्हा छत्रपती संभाजी उद्यान नव्याने विकसित करण्यात आले होते. येथे फावडे कुटुंबास दुकानाचा परवाना देण्यात आला आणि एक जुलै १९५१ पासून तेथे बाबूराव फावडे यांनी चिवडाविक्री सुरू केली. त्या काळात एक आणा, दोन आणे अशी त्या चिवड्याची किंमत असायची. पुढे व्यवसायाचा व्याप वाढल्यावर परशुराम यांचे वडील मधुकर यांनी ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन्स’मधली नोकरी सोडून, या व्यवसायात उडी घेतली. त्यांनी चिवडाविक्रीसोबतच भेळ व पाणीपुरी यांचीही विक्री सुरू केली. आता परशुराम व त्यांचे बंधू वासुदेव हा व्यवसाय सांभाळतात. संभाजी उद्यानाची वेळ मर्यादित केल्याने, तसेच तेथील आकर्षणे घटल्याने व्यवसायावर परिणाम झाल्याची खंत परशुराम फावडे बोलून दाखवतात. त्यांचा स्वभाव गप्पीष्ट, बोलका. बोलता बोलता सढळ हाताने दोन पाणीपुरी प्लेटमध्ये अधिक घालतील. पाणीपुरीतही उगाचच खारी बुंदी, शेव वगैरे जादा गोष्टी टाकण्यावर त्यांचा विश्वास नाही. फक्त पाणीपुरीचं ते खास तयार केलेलं पाणी घालूनच पुरी खायला पाहिजे असा त्यांचा कटाक्ष. तशीच पाणीपुरी आवडते म्हटल्यावर खुलून दोन पुऱ्या प्लेटमध्ये अधिक टाकतात. वर थोडी भेळ ऑफिसमध्ये खायला बांधून देऊ का, असंही म्हणतात. याचे कुठलेही जादा पैसे वगैरे नाहीत. वर्षानुवर्षे बांधून ठेवलेले ग्राहक का बांधून राहतात, याचं गुपित फावडे यांच्याकडं बघितलं की सहज उलगडतं.
पुण्यातल्या सर्व भेळ दुकानांचं आद्यपीठ म्हणता येईल अशी जागा म्हणजे सारसबाग चौपाटी. या परिसरातील समाधान भेळ, संतोष भेळ ही भेळेची दुकानं लोकप्रिय आहेत. समाधान भेळ पर्वती पायथ्याच्या रस्त्याला, दांडेकर पुलाकडे जाताना लागणारं प्रसिद्ध दुकान. हे दुकान ५५ वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. मामा भेळवाले यांची ही भेळ मटकी भेळेसाठी प्रसिद्ध आहे. मुरमुरे, पापडी, शेव, बुंदी, खारे शेंगदाणे, भरपूर कांदा आणि अर्थातच भरपूर मटकी घालून ही भेळ केली जाते. ही मटकी हळद, मीठ घालून चांगली उकडलेली असते. यात वरून घातला जाणारा मसालाही ‘समाधान स्पेशल कांदा-लसूण मसाला’ असतो. सोबत उकडलेली मिरची असतेच. ठेचाही आवडीनुसार मिळतो. लिंबू पिळून, हाताने ही भेळ खाताना उत्तम चवीचा आनंद मिळतो, असं अनेक ग्राहक सांगतात. भांबरकर कुटुंबीयांच्या मालकीचे हे दुकान १९७० पासून सुरू आहे. इथल्या भेळेतलं फरसाण मालक स्वत:च तयार करतात. त्याच्या दर्जाकडे विशेष लक्ष देतात. पुण्यात सनसिटीजवळ यांची दुसरी शाखाही आहे.
सारसबाग चौपाटी परिसरातली आणखी एक प्रसिद्ध भेळ म्हणजे संतोष भेळ. किसनराव पवार यांच्या मालकीचे हे दुकान १९७८ पासून सारसबाग परिसरात आहे. आता संतोष हॉल (सिंहगड रोड), महर्षीनगर इथेही संतोष भेळेच्या शाखा सुरू झाल्या आहेत. कल्पना भेळ ही टिळक रोडवरची आणखी एक प्रसिद्ध व जुनी भेळ. ही भेळ १९४८ पासून पुणेकरांच्या सेवेत आहे. या भेळेची एक शाखा सहकारनगर परिसरातही आहे. टिळक रोडवर या भेळेच्या गाडीवर सत्तरच्या दशकात ‘दाढीवाल्या काकां’ची भेळ खाल्ली नाही, असे पुणेकर सापडणे कठीण. (याच गाडीशेजारी असलेल्या ‘उत्तम चाट भांडार’ या गाडीवर मिळणाऱ्या पाणीपुरीची चव चाखली नसेल असे पुणेकरही क्वचितच असतील. विशेषत: या गाडीवर ज्या आजी (त्यांचं नाव बहुतेक बेबीताई) असायच्या, त्यांच्याच हातची पाणीपुरी विशेष चवीची लागायची, असं अनेक पुणेकर छातीवर हात ठेवून सांगतील. हातची म्हणण्यापेक्षा चमच्याची, कारण या आजी पुरी कधीही हाताने पाण्यात बुचकळून द्यायच्या नाहीत. त्याऐवजी चमच्याने ते पाणी पुरीत भरून द्यायच्या. असो. हे जरा विषयांतर झालं.)
पुणे शहरात गल्लीबोळांत अक्षरश: शेकड्यानी भेळेच्या गाड्या किंवा दुकानं आहेत. स्थानिक लोकांत ते चांगलेच लोकप्रियही आहेत. गेल्या काही वर्षांत, विशेषत: सन २००० नंतर पुणे शहर अवाढव्य पसरलं आहे. निगडीपासून ते कात्रजपर्यंत आणि यवतपासून ते वाघोलीपर्यंत शहर प्रचंड वेगानं विस्तारलं आहे. निगडी प्राधिकरणातला एक चौक तर ‘भेळ चौक’ म्हणूनच प्रसिद्ध आहे. या सर्व ठिकाणच्या भेळेच्या दुकानांची दखल घ्यायची किंवा तिथली भेळ चाखायची तर आयुष्य पुरणार नाही. याशिवाय पुणे जिल्ह्याचा विचार केला तर भेळेच्या दुकानांची संख्या काही हजारांत निश्चितपणे जाईल. नगरहून येताना लोणीकंदजवळील सोमेश्वर मटकी भेळ, सरदवाडीची प्रसिद्ध भेळ, नाशिककडे जाताना चाकण-खेड दरम्यान भामा नदीवरचा पूल ओलांडल्यावर लागणारी तिथल्या स्थानिक भेळेची प्रसिद्ध दुकानं अशी किती तरी उदाहरणं सांगता येतील. पुण्यापासून मुंबई, सातारा, सोलापूर, नगर व नाशिक या सर्व महामार्गांवर आता भेळ व चाट पदार्थ देणारी मोठमोठी दुकाने उभारली गेली आहेत. ती सर्व वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण व त्यामुळं लोकप्रियही आहेत. या सर्वांचा आढावा या एकाच लेखात घेणं खरोखर अवघड आहे आणि एका व्यक्तीची ती मर्यादाही आहे. (त्यामुळं या लेखात काही प्रसिद्ध किंवा आपल्या आवडीच्या भेळेचे उल्लेख राहून गेले असतील, हे अगदी शक्य आहे.)
थोडक्यात, भेळ ही अशी आपल्या नेहमीच्या अळणी जगण्याला खमंग, चटकदार, लज्जतदार बनवणारी एक नामी चीज आहे. आपलं आयुष्य या भेळेतल्या चविष्ट घटकांसारखंच रुचकर आणि उत्तम व्हायला हवं, एवढी शिकवण तर भेळ आपल्याला देतेच!

इति भेळपुराण संपूर्णम्...

---

(पूर्वप्रसिद्धी : पुण्यभूषण दिवाळी अंक २-०२५)

---


2 Feb 2026

मटा पुणे दिवाळी अंक २५ - कथा

रघू अन् रायगडचा थरार
-----------------------------

यंदाच्या दिवाळीत ताडोबा अभयारण्यात जायचं, म्हणून रघू खूश होता. खरं तर त्याच्या शाळेचीच सहल जाणार होती. मात्र, नंतर ती बदलून रायगडावर नेण्याचं ठरलं. रघूला रायगडलाही जायचं होतं आणि ताडोब्यालाही! मात्र, रघूच्या वडिलांनी शाळेच्या सहलीतून रायगडला जा, असं सांगितलं. ताडोबा अभयारण्याला पुढच्या वर्षी नक्की जाऊ, म्हणून रघूच्या बाबांनी त्याची समजूत काढली. त्या दिवशी रघू ताडोब्यातील वाघांची स्वप्नं रंगवतच झोपी गेला... मात्र, स्वप्नात कधी इंटरव्हल झाला ते रघूला कळलंच नाही. न बघितलेल्या ताडोबाची फिल्म जरा जरा ब्लर होत फेड आउट झाली आणि एकदम सह्याद्रीचा एक उंच डोंगर तिथं हळूहळू प्रकट होऊ लागला... आधी निळं आकाश, मग जमीन, त्यावर हिरवेगार डोंगर... ती माची... आणि एकदम त्याला दिसला तो - रायगड. हो, राजांचा गड... हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड. दुर्गांचा दुर्ग, उत्तुंग, बेलाग असा रायगड... रघू एकदम जागा झाला... त्याला नुकतीच झालेली ती सहल आता पुन्हा आठवू लागली...
...त्यांची रायगडची सहल अगदी थरारक झाली होती. रघू पहिल्यांदाच रायगडला गेला होता. त्याला व त्याच्या ग्रुपला खरं तर पायऱ्या चढून गडावर जायचं होतं. मात्र, देशमुख सरांनी डोळे वटारल्यावर सगळी मुलं गप्पच बसली. अर्थात रोप-वेनं जाण्याचा थरारही मस्तच होता. विशेषत: अगदी शेवटी दहा-वीस मीटर अंतर राहिलं असताना ती छोटीशी ट्रॉली आता समोरच्या कातळाला धडकतेच की काय, असं वाटून रघूच्या छातीत धस्स झालं होतं. मात्र, एकदम एक झोका बसला आणि ती ट्रॉली एकदम झुमकन वरच्या डेकवर पोचली होती. सगळा गड हिंडून बघताना रघूला फारच भारी वाटलं होतं. त्याला चौथीत, म्हणजे आधीच्याच वर्षी इतिहासाला ‘शिवछत्रपती’ हेच पुस्तक होतं. त्या पुस्तकावरचं राजा रविवर्मांनी काढलेलं महाराजांचं चित्र रघू कितीदा तरी निरखून पाही. महाराजांकडं नुसतं बघितलं, की रघूला एकदम वेगळं असं, काही तरी ग्रेट वाटत असे. त्याच्या हडकुळ्या दंडात एकदम हत्तीचं बळ आलंय की काय, असं वाटे. हे असं आपल्यालाच होतं, की बाकी मित्रांनाही होतं हे त्याला कळत नव्हतं. एकदा धीर करून त्यानं त्याचा खास मित्र सदूला विचारलं होतं. सदूलाही तसंच होतं, हे कळल्यावर रघूला हुश्श झालं होतं. रायगडावर दिवस कसा गेला, ते कळलंच नव्हतं. महाराजांच्या सिंहासनावर बसलेल्या पुतळ्याकडं बघून रघूचा आख्खा वर्ग थक्क झाला होता. नंतर सर्वांनी ‘छत्रपती शिवाजीमहाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांनी तो परिसर दणाणून सोडला होता. आजूबाजूला आलेले इतर पर्यटकही या पोरांकडं कौतुकानं बघत होते. पुढं होळीच्या माळावर, बाजारपेठेत, गंगासागर तलावावर, जगदीश्वर मंदिरात... सगळीकडं मुलांचा हा जयघोष कायम राहिला. सगळ्यांना आता टकमक टोक बघायची उत्सुकता लागली होती. बरीच मजल, दरमजल करत मुलं तिथं पोचली, तेव्हा त्या टोकावरून महाराष्ट्राच्या सह्याद्रीचं ते भव्य दर्शन बघून सगळ्यांचेच डोळे तृप्त झाले. किती फोटो काढावेत अन् किती नाही, असं मुलांना होऊन गेलं. रघूनं त्याच्या बाबांचा खास कॅमेरा आणला होता. त्यातून तो भराभर फोटो काढत होता. फोटो काढण्यात तो एवढा गुंगून गेला, की शेवटी त्याच्या मित्रानं - सदूनं त्याला ढोसून हलवलं आणि त्या तंद्रीतून जागं केलं. बाकीची मुलं जरा पुढं निघाली होती. देशमुख सरांनी लांबूनच हाक मारली. हे दोघं दिसताच तेही जरा निवांत झाले आणि पुढं चालू लागले.


‘आपण इथं हरवलो तर...’ सदू एकदम म्हणाला.
त्यावर रघू एक क्षण दचकला, पण नंतर त्याला हसू आलं. त्यानं सभोवती पाहिलं. दुपारचे अडीच-तीन वाजले होते. गडावर ऊन होतं, पण गार वारंही सुटलं होतं. त्यामुळं एकूण छान वाटत होतं. मुळात ही महाराजांची राजधानी, त्यामुळं इथं कसलं भय वाटतच नाहीय, असं त्याला एकदम लक्षात आलं. मगाशी सरांनी हिरकणीची कथाही सांगितली होती. ती कथा खरी आहे, की दंतकथा आहे हा वाद सोडून द्या; त्या गोष्टीतलं मर्म लक्षात घ्या, असंही सरांनी सांगितलं होतं.
‘सदू, एक तर सर दर तासाने सर्व मुलांचा काउंट घेतात. शिवाय आपल्याला घेतल्याशिवाय ते कसे परत जातील? शिवाय आपल्याकडं हे बटणाचे का होईना, मोबाइल आहेत, त्यामुळं आपण इथं हरवण्याची शक्यता मुळीच नाही. कळलं का?’ रघू सदूकडं पाहत हसत म्हणाला. त्यावर सदू जरासा खट्टूच झाल्यासारखा वाटला. जणू काही, इथं आपण हरवायला हवं, असंच त्याला वाटत होतं की काय, कोण जाणे!
रघू मात्र इतिहासात हरवला होता. राजांच्या काळातल्या एकेक गोष्टी त्याला आठवत होत्या. इतिहासाचं पुस्तक, पुण्यात नुकतीच पाहिलेली ‘शिवसृष्टी’, त्याच्या बाबांनी आणलेली इतर काही पुस्तकं, यूट्यूबवरची काही भाषणं असं सगळं ऐकून रघूला महाराजांच्या एकूण कार्यकर्तृत्वाविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झालं होतं. त्या इतिहासातल्या सगळ्याच गोष्टी त्याला कळल्या होत्या, असं नव्हे. मात्र, इतिहास शिकवायला देशमुख सरांसारखे फार चांगले शिक्षक लाभल्यामुळं त्याला पुस्तकापलीकडल्या बऱ्याच गोष्टीही समजत होत्या. शिवरायांकडून घेण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजांचं प्रसंगावधान, हे रघूच्या मनावर फार बिंबलं होतं. अनेक संकटांवर मात करण्याची ताकद महाराजांना त्यांच्या या प्रसंगावधानानं व अष्टौप्रहर जागृत असण्याच्या वृत्तीनंच दिली होती, यात शंका नाही असंच रघूला मनोमन वाटत होतं.
आता गड उतरायची वेळ झाली होती. रोप-वे संध्याकाळी विशिष्ट वेळी बंद होत असल्यानं सर सर्वांना लवकर निघायची घाई करत होते. गडावरून खाली उतरणारी शेवटची टीम रघूच्या शाळेची होती. रघूला उतरायची घाई नव्हती. त्याला गडावर जास्तीत जास्त काळ थांबायचं होतं. त्यामुळं तो व सदू रांगेत सर्वांत मागे थांबले. आठ-आठच्या तुकडीनं मुलं दोन्ही पाळण्यांत बसून खाली जात होती. देशमुख सरांना पुढील व्यवस्था करायची होती, म्हणून ते दुसऱ्या की तिसऱ्या बॅचबरोबरच खाली उतरले. शेवटच्या तुकडीत आणि शेवटच्या पाळण्यात फक्त रघू व सदू उरले. त्यामुळं त्यात त्या दोघांनाच बसवण्यात आलं. अगदी थोडं पुढं असलेल्या दुसऱ्या पाळण्यात शाळेतली इतर सात-आठ मुलं बसली होती. रोप-वेतून ते दोन्ही पाळणे आता हळूहळू खाली उतरू लागले. भन्नाट वारा वाहत होता. त्यामुळं ते पाळणे थोडेसे हलत होते. निम्म्या अंतरावर गेल्यावर ते पाळणे अचानक थांबले. थोडा वेळ मुलं तशीच स्वस्थ बसली. रोप-वे असा मधेच थांबणं नॉर्मल आहे का नाही, याची त्या मुलांना काही कल्पना नव्हती. रघू आजूबाजूला पाहत होता. मागे रायगडाचा भक्कम, बुलंद असा कठीण कडा आणि समोर लांबवर पसरलेले सह्याद्रीचे भव्यदिव्य डोंगर, लांबवर तळात दिसणारी रायगडवाडी आणि रोप-वेचं चिमुकलं बोर्डिंग स्टेशन आणि या सगळ्यांत मध्येच अंतराळात तरंगत असलेल्या त्या दोन ट्रॉल्या...
थोडा वेळ गेला... आणखी थोडा वेळ गेला... दोन्ही पाळणे तसेच हवेत स्थिर लटकत होते आणि त्यात ही नऊ-दहा लहान मुलं! आता मात्र सदूला थोडी भीती वाटू लागली. पाळणा हळूहळू खाली जाताना सभोवती पाहताना काही वाटत नव्हतं. मात्र, आता त्या एका जागी स्थिर थांबलेल्या पाळण्यातून खाली नजर जरी तरी गरगरून चक्कर येईल, असं वाटू लागलं. मुलांकडं त्यांच्या सॅक होत्या. मात्र, सगळा खाऊ गडावरच संपला होता. खाली उतरलं, की मुलांना थोड्या वेळात लगेच जेवायचंच होतं. रघूच्या सॅकमध्ये अगदी दोन बिस्किटं आणि थोडं पाणी उरलं होतं. रघूनं ते बघून घेतलं. ‘सदू, तुला पाणी हवंय का?’ रघूनं काळजीनं विचारलं. सदू पटकन ‘हो’ म्हणाला आणि त्यानं ते उरलंसुरलं पाणीही पिऊन टाकलं. आता त्यांच्याकडं पाणी नव्हतं. किती वेळ गेलाय हे कळत नव्हतं. मुलांकडं घड्याळं होती, बटणाचा मोबाइलही होता. मात्र, तो काढून बघण्याचं कुणाला सुचेल तर ना! आधी सुरू असलेला दंगा एकदम गप्प झाला होता. आता काही काही मुलांना रडू येण्याच्या बेतात होतं. रघूला भीती वाटत नव्हती, मात्र थोडी काळजी वाटू लागली होती. ‘आपण महाराजांच्या गडावर आहोत, आपल्याला काही होणार नाही,’ असं त्याला मनोमन वाटत होतं. मगाशी गडावर सांगितल्या गेलेल्या महाराजांच्या एकेक गोष्टी, त्यांचं प्रसंगावधान तो आठवू लागला. त्याला एकदम आठवलं, की आपल्याकडं मोबाइल आहे. त्यानं पटकन खिशातून मोबाइल काढला आणि तो देशमुख सरांना फोन करू लागला. पण... अरे देवा! तिथं मोबाइलला रेंजच नव्हती. खूप वेळ प्रयत्न करूनही फोन लागेना. शिवाय त्याची बॅटरीही संपत चालली होती. आता काय करावं? खालच्या ट्रॉलीत कुणाकडं मोबाइल आहे का, हे विचारावं म्हणून तो मागं वळला आणि त्यानं जरा ओरडून विचारलं, ‘ए राजा, दिन्या, पार्थ... कुणाकडं मोबाइल आहे का रे?’ मात्र, तिथं वारा एवढा जोरात वाहत होता, की खाली काहीच ऐकू जाईना. शिवाय रघू अचानक उठून मागं वळल्यानं त्यांची ट्रॉली एकदम हलली आणि जोरदार हलायला लागली. ते बघून सदूनं दोन्ही दांड्यांना हात घट्ट धरले आणि तो रडायलाच लागला. ते बघून रघूही थोडा घाबरला; पण क्षणभरच! नंतर लगेच सावरून त्यानं पुढचा विचार करायला सुरुवात केली. प्रसंगावधान, प्रसंगावधान... त्याच्या डोक्यात तेच शब्द घुमत होते. त्यानं सॅकमध्ये हात घातला. त्याच्या हातात एक टिश्यू पेपर लागला. त्याच्याकडं पेन होतंच. मग त्यानं त्या टिश्यू पेपरवर ‘तुमच्यापैकी कुणाकडे मोबाइल आहे का?’  असं लिहून तो कागद बोळा करून, खालच्या ट्रॉलीत फेकायचा प्रयत्न केला. पण वारा एवढा जोरात होता, की तो बोळा कुठल्या कुठं भिरकावला गेला. रघूला आता अगदी हताश वाटलं. खरं तर खालच्या ट्रॉलीतील मुलांनी स्वत: डोकं चालवून सरांना फोन लावला असेलच की... मग ती पोरं काहीच बोलत नाहीयेत... नुसतीच घाबरली आहेत... आता काय करावं... रघूच्या मनात विचारचक्र सुरू झालं. त्यानं सॅकमध्ये पुन्हा हात घातला. त्याला लहान चेंडूसारखं काही तरी लागलं. बघतो तर काय, बेसनाचा लाडू! त्याच्या आईनं डब्यात दिलेला. रघूला अतिशय आनंद झाला... त्यानं पुन्हा एक टिश्यू पेपर घेतला, त्यावर वरचा मेसेज पुन्हा लिहिला आणि त्यात लाडू ठेवून तो अगदी अलगद खालच्या ट्रॉलीत फेकला... सदैवानं वारा जरा पडला होता. त्यामुळं तो लाडू व ती चिठ्ठी अगदी नेमकी खालच्या ट्रॉलीत पडली. मुलांनी ती उचलून वाचली. त्यातल्या राजानं मोठमोठ्यानं हातवारे करून काही तरी सांगायला सुरुवात केली. मात्र, परत जोरात वाहायला लागलेल्या वाऱ्यामुळं काहीच ऐकू येईना. शेवटी हातवारे करून राजानं काही तरी सांगितलं. ते बघून रघूला एवढंच समजलं, की त्यांनी सरांना लगेचच फोन केला होता. पण सरांचं बोलणं यांना ऐकूच आलं नाही. मात्र, सरांना ही मुलं अडकून पडल्याचं अर्थातच माहिती होतं. आता हे ऐकून रघूला काय करावं ते सुचेना. त्यानं सरळ ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. सदूनं रडणं थांबवून त्याच्या आवाजात आवाज मिसळला. ती गर्जना मात्र खालच्या मुलांना ऐकू गेली आणि त्यांनीही तशाच घोषणा द्यायला सुरुवात केली. तिसऱ्या घोषणेनंतर ट्रॉली एकदम हलली. मुलं परत घाबरली... त्यांनी समोरचा दांडा घट्ट धरला. मात्र, काही सेकंदांतच त्यांना कळलं, की ट्रॉली खाली खाली जाऊ लागलीय... मुलांना एकदम आनंद झाला. त्यांनी आणखी मोठ्या आवाजात घोषणा द्यायला सुरुवात केली. अवघ्या पाच ते सात मिनिटांत मुलं खालच्या बोर्डिंग स्टेशनला पोचलीसुद्धा. खाली गेल्यावर समोरच उभ्या असलेल्या देशमुख सरांनी सर्व मुलांना जवळ घेतलं. सरही रडवेले झाले होते. सदूसह काही काही मुलं तर रडायलाच लागली होती. रघूला मात्र प्रश्न पडला होता, की ट्रॉली मध्येच का थांबली? त्यानं लगेच सरांकडं धाव घेऊन त्यांना तसं विचारलंही. त्यावर सर म्हणाले, की हा रोप-वे अतिशय सुरक्षित आहे. तो एरवी कधीही बंद पडत नाही किंवा कधी काही तांत्रिक अडचण आली, तर अगदी पाच मिनिटांत तो पुन्हा सुरू होतो. आताही तो पाच ते दहा मिनिटांत परत सुरू झाला...
रघूला हे ऐकून आश्चर्य वाटलं. म्हणजे? आपण केवळ दहा मिनिटं अडकून पडलो होतो? आणि तरीही आपल्याला ते असं मधेच हवेत लटकल्यावर किती काय काय वाटून गेलं! सगळ्यांना किती भीती वाटली!
आणि महाराज... त्यांच्या आयुष्यात तर एकाहून एक जीवावरची संकटं आली. मात्र, त्यांनी कधीही हार मानली नाही किंवा त्यांना कधीही कसली भीती वाटली नाही. प्रसंगावधान आणि कूटनीतीमुळं ते सर्व संकटांतून बाहेर पडले. मग ती आग्र्याहून सुटका असो किंवा पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटणं असो. हे आठवून रघूचं मन भरून आलं. त्यानं पुन्हा एकदा रायगडाच्या त्या भव्य विस्ताराकडं पाहिलं आणि मनोमन हात जोडले.
खालच्या ट्रॉलीतले मित्र भेटले आणि त्यांची थट्टामस्करी सुरू झाली. दिन्या एकदम म्हणाला, ‘रघू, थँक्यू रे... बेसनाचा लाडू फार छान होता...’ सगळे हसले. देशमुख सरही हसून म्हणाले, ‘अहो अंतराळवीर, चला... बस वाट बघतेय आणि तिकडं पुण्यातही आपलं घर आपली वाट बघतंय... चला...’
रघू आणि सदू बसमध्ये बसले. बस भन्नाट वेगात पुण्याकडं निघाली. खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यामुळं रघूला झोप लागली. झोपेत त्याला पुन्हा स्वप्न पडलं. स्वप्नात तो ताडोबा अभयारण्यात पोचला होता... एका पाणवठ्यावर तो उभा होता. आजूबाजूला कोणीही नव्हतं. त्यानं सहज मागं पाहिलं तर दहा फूट अंतरावर झाडाच्या खोडाआडून एक भलामोठा वाघ - हा बहुतेक ‘छोटा मटका’ होता - त्याच्याकडंच रोखून बघत होता... आता? रघू काय करणार?
‘प्रसंगावधान, प्रसंगावधान...’ रघू किंचाळत ओरडत उठला. सदू त्याच्याकडं आश्चर्यानं बघत होता. ‘काय झालं रे?’ त्यानं काळजीनं विचारलं.
रघूनं आजूबाजूला पाहिलं. तो बसमध्येच होता. वाघबिघ कुणी नव्हतं. आता बाहेर अंधार पडला होता... रायगड किल्ला मागे पडला होता आणि रघू मनातल्या मनात हसत होता... म्हणत होता, ‘महाराज, तु्म्ही असेच सतत मनात राहायला येत जा...’

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे दिवाळी अंक २०२५)

----