22 Mar 2023

साहित्य शिवार दिवाळी अंक लेख २०२२

राष्ट्रप्रेमाचा धगधगता अंगार
--------------------------------



शहीद भगतसिंग, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांच्याविषयी आपण सगळे लहानपणापासून वाचत आलो आहोत, ऐकत आलो आहोत. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात पंजाब, महाराष्ट्र आणि बंगाल या तीन प्रांतांचा सिंहाचा वाटा होता. या तीन राज्यांतील जणू प्रतिनिधी म्हणून हे तिघे वीर ब्रिटिशांच्या सत्ताकाळात २३ मार्च १९३१ रोजी लाहोर कारागृहात फासावर गेले. या तिघांपैकी भगतसिंग हे सर्वाधिक लोकप्रिय. भगतसिंग यांचे कार्यकर्तृत्व निश्चितच मोठे. मात्र, त्या तुलनेत राजगुरू वा सुखदेव यांच्याविषयी आपल्याला फार माहिती नसते. हुतात्मा राजगुरू हे तर आपल्या मराठी मातीतले स्वातंत्र्यसैनिक. अतिशय मोठा माणूस. विशेष म्हणजे आम्हा ब्रह्मे व राजगुरू लोकांचे ते थेट पूर्वज. ही गोष्ट मला अर्थातच खूप नंतर समजली. आपल्या घराण्यात एवढा मोठा क्रांतिकारक होऊन गेला हे समजलं तेव्हा माझी छाती अभिमानानं भरून आली. आता आमचं आडनाव ब्रह्मे आणि हुतात्मा राजगुरू हे तर राजगुरू. मग आमचा आणि त्यांचा संबंध कसा आला? राजगुरूंचं मोठेपण सांगता सांगता हा वैयक्तिक नातेसंबंधही इथं सांगणं अप्रस्तुत ठरणार नाही, असं वाटतं.
हुतात्मा राजगुरू यांचं मूळ गाव चाकणजवळचं खेड. हा तरुण स्वकर्तृत्वाने काशीस संस्कृतचा पंडित बनला होता. संस्कृतमध्ये ते सहज संभाषण करीत असत. केवळ इतकंच नव्हे, तर शरीरही कमावलेलं होतं. कुस्तीत त्यांचा हात धरणारा कुणीच नव्हता. महत्त्वाचं म्हणजे ते अव्वल नेमबाज होते. असं सांगतात, की उताणे झोपून पाठीमागे असलेले लक्ष्यही ते बाणाने सहज उडवत असत. स्वातंत्र्याच्या ध्येयानं प्रेरित झालेला हा तरुण आपला देह कणखर करण्यासाठी काय काय करीत होता? रात्रीतून धावत-धावत १५-२० मैल अंतरावरील स्मशानात जायचं, तेथील विहिरीत पोहायचं आणि तशीच दौड करीत पुन्हा येऊन झोपायचं! आहे की नाही कमाल! इतका त्यांचा स्टॅमिना होता, की तासन् तास मुंग्यांच्या वारुळावर बसून दाखवत. अर्थातच मुंग्या चावा घेत. तरीही शिवरामच्या चेहऱ्यारील रेषही हलत नसे. एकदा त्यांनी एक जळती चिमणी एका हाताने दाबून फोडली. लोखंडी सांगाड्याचाही पार चुरा केला. त्यांचा हात अर्थातच खूप भाजला, काचांनी रक्तबंबाळ झाले तरीही त्यांनी हूं की चूं केले नाही.
ज्या साँडर्सच्या हत्येबद्दल भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांनाही फाशी झाली, त्या साँडर्सला मारले तेव्हाचा प्रसंग. साँडर्स आपल्या टप्प्याबाहेर आहे; त्याला गोळी लागणे शक्य नाही, अशी शंका भगतसिंगांना वाटत होती. राजगुरूंनी मात्र भगतसिंग नको नको म्हणत असतानाही तितक्याच अंतरावरून चालवलेली गोळी साँडर्सच्या दोन भुवयांच्या बरोबर मधोमध कपाळातून आरपार गेली. राजगुरूंनी लक्ष्याकडे पाहिलेदेखील नाही.
हे बघून भगतसिंग थक्क झाले. विश्वास न बसून त्यांनी नंतर त्या प्रेताला जवळून आठ गोळ्या मारल्या.
असे होते महान क्रांतिकारक राजगुरू!
आपल्याला मात्र त्यांच्याविषयी फार फार कमी माहिती होती. मी स्वत:ही याला अर्थातच अपवाद नाही. मात्र, नशिबाने पुढं मला राजगुरूंचं कार्य जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली. आपल्याच महान पूर्वजांबद्दल माझ्या मनात असलेल्या अज्ञानाचा घोर अंधार थोडा तरी दूर झाला आणि त्यांच्याविषयीच्या कृतज्ञतेचा एक नंदादीप आता माझ्या मनात कायमचा तेवत राहिला आहे.
मी राजगुरूंपर्यंत कसा पोचलो, याची पार्श्वभूमी इथं थोडीशी सांगायला हवी.
मला लहानपणापासूनच आमच्या ब्रह्मे या आडनावाविषयी कुतूहल वाटत असे. आपलं आडनाव वर्गातल्या इतर मुलांसारखं कुलकर्णी, देशपांडे, पाटील, देशमुख, पवार असं काही नसून ‘ब्रह्मे’ असं जरा (तेव्हा) अवघड वाटणारं का आहे, असा प्रश्न पडायचा. फार प्रश्न पडू न देण्याचा आणि पडले तरी न विचारण्याचा तो काळ असल्यामुळं मनातल्या या शंका आणि प्रश्न मनातच राहिले. आम्ही तेव्हा जामखेडला राहत असू. माझा जन्मही तिथलाच. त्यामुळं तेच आपलं मूळ गाव अशी माझी समजूत होती. पण कधी तरी आजोबांच्या आणि इतर चुलत आजोबा किंवा काका मंडळींच्या बोलण्यात आपलं मूळ गाव पुण्याजवळचं ‘चाकण’ आहे, असं यायचं. मी तोवर चाकण हे गाव पाहिलंही नव्हतं. चाकणच्या भुईकोट किल्ल्याचा रणसंग्राम आणि किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांचा पराक्रम याविषयी नंतर इतिहासाच्या पुस्तकांत त्रोटक वाचलं. आमचं एक कुलदैवत म्हणजे चाकणचा मुंजा. तो या चाकणच्या भुईकोट किल्ल्याच्या आतच आहे. किल्ल्याचं बांधकाम करताना ब्रह्मे घराण्यातील नऊ वर्षांच्या दामोदर नावाच्या मुलाचा बळी दिला होता आणि त्याचंच मंदिर आता तिथं आहे, अशी हकीकत घरातले जाणकार सांगायचे. त्या लहान वयातही इतक्या लहान मुलाचा बळी देण्याच्या कल्पनेनं मला प्रचंड रडू फुटलं होतं. तरीही तो किल्ला किंवा चाकणपर्यंत पोचण्याचं काही कारण दिसत नव्हतं.
मी १९९१ ला दहावीनंतर पुण्यात गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला. तिथं होस्टेलवर माझा रूम पार्टनर होता नीलेश नगरकर. त्याचं गाव होतं राजगुरुनगर. अर्थात ते पुण्याहून एका तासाच्या अंतरावर असल्यानं तो दर आठवड्याला घरी जायचा. तुलनेनं मला नगरला जाणं थोडं लांब पडायचं. त्यामुळं मी पंधरा दिवस किंवा तीन आठवड्यांनी घरी जायचो. जेव्हा मी घरी जायचो नाही, तेव्हा नीलेश मला त्याच्या घरी - खेडला - येण्याचा आग्रह करायचा. मी त्याच्याबरोबर अनेकदा त्याच्या घरी जायचो. एक दिवस राहायचो आणि दुसऱ्या दिवशी दोघेही होस्टेलला परत यायचो. तर हा माझा मित्र राजगुरुनगरला जिथं राहत होता, ते हुतात्मा राजगुरूंचं घर होतं. तो एक वाडा होता. एका बाजूला राजगुरूंचं छोटंसं स्मारक होतं आणि दुसऱ्या बाजूला काही बिऱ्हाडं राहत होती. तेव्हा राजगुरूंच्या या वास्तूनं अशा रीतीनं मला तिच्याकडं वारंवार बोलावून घेतलं होतं. अर्थात तेव्हा आम्ही तसे लहान होतो आणि आमच्या नव्या अभ्यासक्रमात स्थिर होण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळं राजगुरूंची जुजबी माहिती घेण्यापलीकडं आणि त्या वाड्यात येता-जाता त्यांच्या तसबिरीला नमस्कार करण्यापलीकडं फार काही हातून झालं नाही.
पुढं अशा काही घटना घडल्या, की मी इंजिनीअरिंग डिप्लोमा सोडून पत्रकारितेत घुसलो. नगरला ‘लोकसत्ता’त काम करत असताना तिथं विलास राजगुरू हा तरुण पेजमेकिंग आर्टिस्ट म्हणून रुजू झाला. त्याच्याशी ओळख वाढली, तेव्हा कळलं, की तो हुतात्मा राजगुरूंचा थेट वंशज आहे. मला हे ऐकून सुखद धक्काच बसला. मी विलासच्या घरी गेलो, तेव्हा कळलं, की त्याचे वडील रोज घरासमोर आपला तिरंगा लावतात आणि संध्याकाळी  (नियमाप्रमाणे) उतरवून ठेवतात. तेव्हा राष्ट्रध्वजाबाबतचे नियम बरेच कडक होते आणि कुणालाही असा घरासमोर राष्ट्रध्वज लावता यायचा नाही. मात्र, विलासच्या वडिलांनी प्रशासनाकडून खास परवानगी मिळविली होती आणि राजगुरूंचे वंशज म्हणून त्यांना तशी परवानगी मिळालीही होती. त्यांच्या घरासमोर डौलानं फडकणारा तिरंगा पाहून मला काय वाटलं, हे मी खरोखर शब्दांत सांगू शकत नाही. हुतात्मा राजगुरू भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या १६ वर्षं आधीच हुतात्मा झाले होते. त्यांना स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकताना पाहायला मिळाला नव्हता. ‘इन्किलाब झिंदाबाद’ म्हणत ते कोवळे, विशीतले तीन वीर हसत हसत फासावर गेले होते. पुढं विलासकडूनच मला राजगुरू आणि ब्रह्मे हे पूर्वीचं एकच घराणं कसं होतं, याची माहिती मिळाली. विलासनं अतिशय मेहनतीनं या सर्व इतिहासावर एक पुस्तकच लिहिलं आहे. सिद्धेश्वरशास्त्री ब्रह्मे या सिद्धपुरुषापासून आमच्या घराण्याचा इतिहास ज्ञात आहे. शहाजीराजे व छत्रपती शिवरायांकडे अनुष्ठान वा मोठा धार्मिक कार्यक्रम असल्यास ते पौरोहित्यासाठी जात असत. कचेश्वरशास्त्री हे त्यांचे चिरंजीव. त्यांना शाहू महाराजांच्या काळात ‘राजगुरू’ ही उपाधी मिळाली असं सांगतात. तेव्हापासून ब्रह्मे घराण्यातील एका शाखेचं आडनाव ‘राजगुरू’ असं झालं. 

हे कळल्यावर मला राजगुरूंविषयी वाटणारा आदर आपुलकी आणि जिव्हाळ्यात परिवर्तित झाला. त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्यावं, अशी उत्सुकता वाटू लागली. इतिहासाच्या पुस्तकांत किंवा इंटरनेटवरही त्यांच्याविषयी तशी त्रोटकच माहिती उपलब्ध आहे. मीही हा लेख लिहिताना याच माहितीचा आधार घेतला आहे.
शिवराम हरी राजगुरूंचा जन्म २४ ऑगस्ट १९०८ रोजी खेड इथं मध्यमवर्गीय कुटुंबातला. त्यांच्या वडिलांचे नाव हरी नारायण राजगुरू. त्यांनी दोन विवाह केले होते. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव पार्वतीबाई. हरी राजगुरू व पार्वतीबाई यांना एकूण पाच अपत्ये झाली. शिवराम हे त्यांचे पाचवे अपत्य. त्यांचं प्राथमिक शिक्षणही खेड इथंच झालं. शिवराम सहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचा सांभाळ त्यांचे मोठे बंधू व आईने केला. वयाच्या चौदाव्या वर्षी इंग्रजी विषयातील अपयशानंतर त्यांच्या भावाने आपल्या नववधूसमोर त्यांना इंग्रजी धडा वाचण्याची शिक्षा केली. हा अपमान सहन न झाल्याने लहानग्या शिवरामने अंगावरील वस्त्रांनिशी घर सोडलं. नंतर शिवराम राजगुरू अमरावतीला गेले. तेथील प्रसिद्ध हनुमान व्यायामशाळेच्या वातावरणात त्यांनी देशभक्तीची दीक्षा घेतली. वयाच्या १५ व्या वर्षी ते काशीला संस्कृत शिकण्यासाठी गेले. संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवतानाच न्यायशास्त्रातील मध्यमा परीक्षाही ते उत्तीर्ण झाले. ‘लघु सिद्धान्त कौमुदी’चा त्यांनी अभ्यास केला. त्यांना संस्कृत व मराठीखेरीज इंग्रजी, कन्नड, मल्याळी, हिंदी व उर्दू या भाषाही चांगल्या येत होत्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची गनिमी युद्ध पद्धती यांबद्दल त्यांना विशेष आकर्षण होतं. काही काळ राजगुरूंनी काँग्रेस सेवादलातही काढला. वाराणसीला असतानाच त्यांची सचिन्द्रनाथ संन्याल, चंद्रशेखर आझाद आदी क्रांतिकारी नेत्यांशी ओळख झाली. मग ‘हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी’मध्ये दाखल होऊन त्यांनी उत्तर भारतात क्रांतिकार्यात भाग घेतला. ‘रघुनाथ’ या टोपणनावाने ते त्या वेळी प्रसिद्ध होते. पुढे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी सुरू झाल्यावर ते या क्रांतिकारी सैन्याचे सैनिक बनले. त्यांचा बंदुकीचा नेम अचूक होता. त्यानंतर त्यांची भगतसिंग, जतिनदास, सुखदेव आदी नेत्यांशी, विशेषतः पंजाबी क्रांतिकारी नेत्यांशी मैत्री झाली.
राजगुरू २० वर्षांचे असताना भारतात ब्रिटिशांनी सायमन कमिशन पाठवले. या सायमन कमिशनच्या विरोधात झालेल्या आंदोलनात थोर नेते लाला लजपतराय जबर जखमी झाले. त्यातच १७ नोव्हेंबर १९२८ रोजी लालाजींचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा पंजाबी क्रांतिकारी नेत्यांनी निर्धार केला. यासाठी चंद्रशेखर आझाद, राजगुरू, भगतसिंग आणि जयगोपाल यांची नेमणूक करण्यात आली. चंद्रशेखर आझाद व राजगुरू हे दोघेही संयुक्त प्रांतातून आले. पंजाब आणि उत्तर प्रदेश शाखेच्या नेत्यांनी संयुक्तपणे लाहोरमध्ये ही कृती केली. या हल्ल्ल्याला जबाबदार असलेल्या स्कॉट या अधिकाऱ्याला मारायचं या क्रांतिकारकांनी ठरवलं होतं. मात्र, स्कॉटऐवजी चुकून ब्रिटिश पोलिस अधिकारी साँडर्स मारला गेला. साँडर्सवर लाहोरला १७ डिसेंबर १९२८ रोजी हल्ला झाला, तेव्हा पहिल्या दोन गोळ्या राजगुरूंनी झाडल्या. पंजाबी नेते पुढे कौन्सिल हॉलमधल्या बॉम्बबफेकीनंतर पकडले गेले; पण आझाद व राजगुरू दोन वर्षे अज्ञातस्थळी भूमिगत होते. भगतसिंग व राजगुरू दोघांनीही वेष बदलून लाहोर सोडले. भगतसिंग लाहोरवरून हावड्याला गेले, तर राजगुरू आधी लखनौला आणि तेथून वाराणसीला गेले. नंतर ते उत्तर प्रदेशातून नागपूरला आले. तेथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकाच्या घरी त्यांनी आश्रय घेतला. तेथून पुण्याला जात असताना ३० सप्टेंबर १९२९ रोजी - म्हणजे साँडर्सच्या हत्येनंतर २२ महिन्यांनी - राजगुरूंना अटक करण्यात आली. तिघांवर खटला भरण्यात आला. निकाल काय लागणार, हे स्पष्टच होतं. त्यांना भगतसिंग, सुखदेव यांच्याबरोबर लाहोरच्या कोट लखपत कारागृहात फाशी चढविण्यात आलं. मृत्यूनंतर फिरोजपूर जिल्ह्यात सतलज नदीच्या किनारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भगतसिंग या क्रांतिकारकांचे मुख्य होते, त्यामुळे त्यांचे नाव व लोकप्रियता तुलनेनं अधिक होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही भगतसिंग यांच्याविषयी अधिक बोलले गेले. ते अजिबात गैर नाहीच; परंतु राजगुरू व सुखदेव यांच्यावर मात्र काहीसा अन्याय झाला. राजगुरू यांच्या स्मरणार्थ खेड या त्यांच्या गावाचे नाव बदलून ‘राजगुरुनगर’ करण्यात आले. मात्र, त्यांच्या जन्मस्थळी अद्यापही त्यांच्या कर्तृत्वाला शोभेल असे भव्य स्मारक झालेले नाही. या भागातले लोकप्रतिनिधी दर वर्षी हुतात्मा दिनाला तशी मागणी करतात. मात्र, पुढे त्याचे काहीही होत नाही. हे भव्य स्मारक होणं आणि पुढच्या पिढीला हुतात्मा राजगुरूंविषयी अधिकाधिक माहिती होणं हीच खरी या थोर क्रांतिकारकाला आदरांजली ठरेल.


(पूर्वप्रसिद्धी : साहित्य शिवार दिवाळी अंक २०२२)

----

17 Mar 2023

रॉकेट बॉइज-२ - रिव्ह्यू

देशप्रेमाचं उत्तुंग यान
-----------------------



भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आजपर्यंत देशाची जी वैज्ञानिक प्रगती झाली आहे, तीत डॉ. होमी भाभा व डॉ. विक्रम साराभाई यांचा सिंहाचा वाटा आहे. डॉ. भाभा यांना ‘भारतीय अणुबॉम्बचे जनक’, तर डॉ. साराभाई यांना ‘भारतीय अवकाश तंत्रज्ञानाचे जनक’ असंच सार्थपणे म्हटलं जातं. आपल्याला एखाद्या राजकारण्याची किंवा प्रसिद्ध नटाची जेवढी माहिती असते, तेवढी दुर्दैवाने आपल्या शास्त्रज्ञांची नसते. शाळेत एखाद्या धड्यात एखादा परिच्छेद उल्लेख असेल तर तेवढाच. बाकी त्यांच्याविषयी कुतूहल निर्माण व्हावं, त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्यावं असं वाटण्याजोगी परिस्थिती माझ्या बालपणी तरी सभोवती नव्हती. चित्रपट माध्यम ताकदवान असलं, तरी मुख्य प्रवाहातील चित्रपटांच्या विषयांना अंगभूत मर्यादा आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांच्या आयुष्यावर चित्रपट तयार होतील, असं गेल्या दोन दशकांपूर्वी तरी नक्कीच वाटत नव्हतं. एकविसाव्या शतकानंतर परिस्थिती काहीशी बदलली असली, तरी ‘ओटीटी’चं आगमन झाल्यापासून ती विशेष पालटली आहे, असं म्हणता येईल. त्यामुळेच डॉ. भाभा व डॉ. साराभाई यांचं जीवन उलगडून दाखविणारी ‘रॉकेट बॉइज’ ही वेबसीरीज आपल्याकडे तयार होऊ शकली. ‘सोनी लिव्ह’वर गेल्या वर्षी या सीरीजचा पहिला सीझन प्रदर्शित झाला. खरं सांगायचं तर सुरुवातीचे एक-दोन भाग बघून मला ती सीरीज चक्क बोअर झाली व मी ती बघायची बंद केली. मग कुठे तरी पुन्हा या सीरीजची चर्चा कानी पडली तेव्हा मग पुन्हा बघायला घेतली आणि निग्रहानं पूर्ण केली.
सुमारे दीड वर्षानं या सीरीजचा दुसरा सीझन आला आहे. काल मी तो बघायला सुरुवात केली आणि त्यात एवढा गुंतून गेलो, की सलग आठ भाग बघूनच (बिंज वॉच) थांबलो. मी फार क्वचित सीरीज अशा ‘बिंज वॉच’ केल्या आहेत. त्यातली ही एक. साधारण ४० ते ५० मिनिटांचा एक भाग असे हे आठ भाग आपल्याला खिळवून ठेवतात, याचं कारण स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वांत महत्त्वाच्या कालखंडाचं चित्रण डॉ. भाभा व डॉ. साराभाई यांच्या जीवनकथेच्या रूपानं आपल्यासमोर येतं. यात १९६४ ते १९७४ असा दहा वर्षांचा कालखंड दाखविण्यात आला आहे. इथं एक गोष्ट सांगायला पाहिजे, की पहिला सीझन पूर्ण बघितल्याशिवाय हा सीझन बघायला सुरुवात करू नये. पहिल्या सीझनमधले अनेक संदर्भ या दुसऱ्या सीझनमध्ये येतात. पहिला सीझन जरा निग्रहानं बघायला लागतो. मात्र, डॉ. भाभा व डॉ. साराभाई यांची जडणघडण कशी झाली, याचं ते चित्रीकरण आहे. त्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते अर्थात १९६४ पर्यंतचा काळ आहे. 

दुसऱ्या सीझनमध्ये मात्र वेगवान घटनांची ‘तुफान मेल’च आहे. कॅथरिन फ्रँक यांचं ‘इंदिरा - ए लाइफ ऑफ इंदिरा नेहरू गांधी’ हे माझं आवडतं पुस्तक आहे. त्यात फ्रँक यांनी इंदिराजींच्या आयुष्यातल्या व त्यासोबतच भारताच्या इतिहासातल्या अनेक गोष्टींचं दस्तावेजीकरण करून ठेवलंय. ज्यांना त्या घटना, त्यांचा क्रम, राजकीय महत्त्व, सामाजिक महत्त्व माहिती आहे त्यांना ‘रॉकेट बॉइज’चा दुसरा सीझन बघायला मजा येईल. त्यामुळे माझी अशी शिफारस आहे, की या कालखंडातील महत्त्वाच्या घटना जाणून घेऊन मगच ही मालिका बघायला घ्यावी. सत्तरचं दशक नवभारतातलं ‘नवनिर्माणाचं दशक’ म्हणून ओळखलं जातं. स्वातंत्र्य मिळून दीड दशक झालं होतं. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांत भारतात नवनिर्माण सुरू होतं. नवी धरणं बांधली जात होती, नवे वैज्ञानिक प्रकल्प उभे राहत होते, उत्तमोत्तम कादंबऱ्या लिहिल्या जात होत्या, चांगले चित्रपट येत होते, वेगळं संगीत तयार होत होतं... याच काळात डॉ. भाभा व डॉ. साराभाई यांच्यासारखे द्रष्टे शास्त्रज्ञ ५० वर्षांनंतर भारत कुठे असेल, याची स्वप्नं बघत होते. (त्यांच्या जोडीला तेव्हा कलाम नावाचा एक भरपूर केस वाढवलेला, उत्साही तरुणही सोबत असायचा.) 
भारत १९६२ च्या चीन युद्धानंतर बॅकफूटला गेला होता. दुष्काळ, अन्नधान्याची टंचाई, भूकबळी या समस्या सार्वत्रिक होत्या. ‘रॉकेट उडवून काय करायचं? गरीब देशाला परवडणार आहे का ते?’ या आणि अशा मतांची केवळ जनतेत नव्हे, तर सरकारमध्येही चलती होती. अणुबॉम्बचं तर नावही काढायची चोरी होती. भारत हा बुद्धांचा देश होता, महात्मा गांधींचा देश होता. या देशाला अणुबॉम्ब कशाला पाहिजे? अमेरिकादी पाच नकाराधिकारप्राप्त देश अणुचाचण्या करून बसले होते आणि आता त्यांना जगात कुणीही अणुबॉम्ब बनवायला नको होता. अमेरिकेच्या ‘अरे’ला ‘का रे’ म्हणण्याची राजनैतिक हिंमत भारताच्या नेतृत्वाकडे नव्हती, याचं कारण आंतरराष्ट्रीय परिस्थिती वेगळीच होती. शीतयुद्धाचा काळ जोरात होता. शस्त्रस्पर्धा ऐन भरात होती. सीआयए, केजीबी, मोसाद यांच्या आंतरराष्ट्रीय कारवायांना ऊत आला होता. त्यांच्या कारवायांच्या दंतकथा आणि बाँडपट यांच्यात फारसा फरक उरला नव्हता. 
‘रॉकेट बॉइज’च्या दुसऱ्या सीझनला या सगळ्या आंतरराष्ट्रीय घटना-घडामोडींचा विस्तृत पट लाभला आहे. त्या भव्य पटावर ही कथा बघताना डॉ. भाभा, पं. नेहरू, डॉ. साराभाई, इंदिरा गांधी या सगळ्यांचं मोठेपण ठसल्याशिवाय राहत नाही. डॉ. भाभा व डॉ. साराभाई यांच्यातही मतभेद होतेच. डॉ. साराभाई थोडेसे मवाळ स्वभावाचे होते, तर डॉ. भाभा म्हणजे आयुष्य पूर्णपणे एंजॉय करणारे, मस्तमौला व्यक्तिमत्त्व! दोघांच्या स्वभावाचं प्रतिबिंब त्यांच्या कामगिरीतही दिसतं. या जोडीला दोघांच्या वैयक्तिक आयुष्यातले चढ-उतारही आपल्याला दिसत राहतात. विशेषत: डॉ. साराभाई आणि कमला चौधरी यांच्या नात्यामुळं मृणालिनी व साराभाई यांच्यात निर्माण झालेले मतभेद आणि पुढं त्यांचं मनोमिलन हा सगळा भाग दिग्दर्शकानं फार प्रगल्भतेनं हाताळलाय. छोट्या मल्लीचंही (मल्लिका साराभाई) दर्शन यात घडतं. 
या सर्व घटनाक्रमात नाट्य निर्माण करणारे दोन फितुर म्हणजे माथूर आणि प्रसन्नजित डे हे दोघे जण. हे या कथानाट्यातले व्हिलन आहेत. मेहदी रझा या शास्त्रज्ञाचे होमी भाभांशी असलेले मतभेद व वाद पहिल्या सीझनमध्ये आले आहेत. य वादाचे पडसाद या सीझनमध्ये भयानक पद्धतीने पडतात. नेहरूंचं निधन, लालबहादूर शास्त्री पंतप्रधानपदी येणं, त्यांचा ताश्कंदमध्ये झालेला संशयास्पद मृत्यू, इंदिरा गांधींची पंतप्रधानपदी झालेली निवड, कामराज व मोरारजी यांचं राजकारण, होमी भाभांचं नेहरूंना ‘भाई’ व इंदिराजींना ‘इंदू’ असं जवळिकीनं संबोधणं, साराभाईंच्या नियुक्तीवरून केंद्रीय मंत्रीमंडळात इंदिराजींना झालेला विरोध, सीआयएची कारस्थानं, माथूर व डे यांचे देशविरोधी उद्योग, डॉ. भाभा यांचं ‘विमान अपघाता’त झालेलं धक्कादायक निधन, इंदिराजींना बसलेला धक्का, पुढं काही विशिष्ट घटनाक्रमानंतर डॉ. साराभाईंना अणुबॉम्ब बनविण्याची जाणवलेली निकड, इंदिराजींच्या पुढाकारानं सुरू झालेला भारताचा अणुबॉम्ब तयार करण्याचा गुप्त कार्यक्रम, ‘दूरदर्शन’चे कार्यक्रम सॅटेलाइटद्वारे देशभर प्रसारित करण्याची डॉ. साराभाईंची धडपड, रॉकेटची अयशस्वी उड्डाणं, नंतर आलेलं यश, विक्रम-मृणालिनी यांचं एकत्र येणं, साराभाईंचा थुंबा येथे अचानक झालेला मृत्यू, त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी डॉ. कलाम, डॉ. राजा रामण्णा, अय्यंगार व इतर शास्त्रज्ञांनी जीवतोड मेहनत घेणं, अणुबॉम्ब निर्मितीचा कार्यक्रम अमेरिकेपासून गुप्त ठेवण्यासाठी केलेल्या नाना क्लृप्त्या-युक्त्या असा सगळा घटनाक्रम या सीझनमध्ये आपल्यासमोर धबधब्यासारखा आदळत राहतो. या सर्वांचा कळसाध्याय म्हणजे १९७४ मध्ये भारताने पोखरणमध्ये केलेली पहिली यशस्वी अणुचाचणी! ती चाचणी आणि ती पूर्ण करण्याआधी आलेल्या अडचणी हे सगळं प्रत्यक्षच बघायला हवं!
ही सगळी केवळ या दोन शास्त्रज्ञांची कहाणी न राहता, ही आपल्या देशाच्या प्रगतीच्या विलक्षण धडपडीची कहाणी झाली आहे, हे दिग्दर्शक अभय पन्नूचं सर्वांत मोठं यश आहे. म्हणूनच हा सीझन देशप्रेम, स्वाभिमान, जिद्द अशा अनेक भावनांवर स्वार होऊन, एका विलक्षण उंचीवर जाऊन पोचला आहे. अभय कोरान्ने यांनी या मालिकेचं लेखन केलं आहे. त्यांचं श्रेय महत्त्वाचं आहे. यातील सर्वच कलाकारांची कामं उत्कृष्ट झाली आहेत. डॉ. भाभांच्या भूमिकेत जिम सरभ या अभिनेत्यानं कमाल केली आहे. इश्वाकसिंह या अभिनेत्याने डॉ. साराभाई उत्तम उभे केले आहेत. मृणालिनी साराभाईंच्या भूमिकेत रेजिना कॅसँड्रा ही अभिनेत्री अप्रतिम शोभली आहे. विशेषत: तिचे नृत्य व मुद्राभिनय खास! नेहरूंच्या भूमिकेत रजित कपूर एकदम फिट! (एका प्रसंगात ते मद्यपान करताना व सिगारेट ओढताना दाखवले आहेत. नेहरू या दोन्ही गोष्टी करत होतेच; त्यामुळं त्यात काही गैर नाही. मात्र, वेबसीरीज नसती तर असे दृश्य कुणी दाखवू शकले असते काय, असे वाटून गेले!) रझाच्या भूमिकेत दिव्येंदू भट्टाचार्य या अभिनेत्याने अक्षरश: जीव ओतला आहे. शेवटी या व्यक्तिरेखेसाठी आपल्याला अतिशय वाईट वाटतं, त्याचं श्रेय या अभिनेत्याला नक्कीच आहे. अर्जुन राधाकृष्णन या तरुणाने डॉ. कलाम छान साकारले आहेत. (ही मालिका संपली असली, तरी डॉ. कलाम व त्यांचे सहकारी यांच्या कामगिरीवर पुढचा सीझन यावा असं वाटण्याइतपत या दुसऱ्या सीझनमध्ये डॉ. कलाम यांचा प्रेझेन्स आहे.) चारू शंकर यांनी साकारलेल्या इंदिराजी ठीकठाक. त्यांचा प्रोस्थेटिक मेकअप अगदी जाणवतो. सर्वांत खटकले ते यशवंतराव चव्हाण. यशवंतराव हे काळे-सावळे असले, तरी तेजस्वी व राजबिंडे व्यक्तिमत्त्व होते. या मालिकेत यशवंतरावांची व्यक्तिरेखा मात्र अजिबात नीट ठसली नाही. कामराज व मोरारजी मात्र जमले आहेत.
आपल्या देशात गेल्या ७०-७५ वर्षांत काहीच झालं नाही, वगैरे प्रचार हल्ली सुरू असतो. तो मनावर ठसविण्यापूर्वी ही मालिका नक्की बघावी. आपलं देशप्रेमाचं रॉकेट आकाशात उत्तुंग झेपावल्याशिवाय राहणार नाही!

---

दर्जा - चार स्टार

---

9 Feb 2023

वर्धा डायरी - उत्तरार्ध

‘पागल दौड’ विसरताना...
------------------------------



दुसऱ्या दिवशी अभिजित व मी लवकर उठलो. खाली जाऊन चहा घेणं गरजेचं होतं. हॉटेलच्या जवळच एक ‘आरंभ अमृततुल्य’ आणि एक ‘परमात्मा वडापाव सेंटर’ दिसलं. पुण्याबाहेर पूर्वी ‘अमृततुल्य’ दिसत नसे. सोशल मीडियाच्या या काळात सगळीकडं सांस्कृतिक सपाटीकरण झालं आहे. त्या दुकानातल्या पाट्या थेट पुणेरी होत्या. ‘परमात्मा वडापाव सेंटर’मध्ये तर्री पोहेही मिळत होते. अभिजितला भूक लागली होती. त्यामुळं एक प्लेट पोहे घेऊन ताव मारला. जरा वेळानं आवरून तिघंही पुन्हा ‘ऑटो’ करून संमेलनस्थळी पोचलो. (शंभर रुपये झाले हे आता सांगायला नको!) आज सकाळी मुख्य मंडपात डॉ. अभय बंग यांची मुलाखत होती. संपूर्ण संमेलनातलं माझ्यासाठी तरी हे एक प्रमुख आकर्षण होतं. आम्ही नाश्त्यासाठी भोजन कक्षात पोचलो, तेव्हा यशो (यशोदा वाकणकर) आणि मुक्ता (पुणतांबेकर) दोघीही तिथंच होत्या. विवेक सावंत आणि विनोद शिरसाठही होते. सावंत, शिरसाठ आणि मुक्ता हे तिघं अभय बंगांची मुलाखत घेणार होते. मुलाखतीची अधिकृत वेळ सकाळी ९.३० असली, तरी ती इथल्या शिरस्त्याप्रमाणे उशिरा सुरू होणार, हे आता जवळपास सगळ्यांनी गृहीत धरलं होतं. त्यातही तिघेही मुलाखतकर्ते आमच्यासोबतच असल्यामुळं आम्ही निवांत ब्रेकफास्ट केला. 
ब्रेकफास्टनंतर मुख्य मंडपात येऊन बसलो. मुलाखत साधारण साडेदहा वाजता सुरू झाली. शिरसाठ, मुक्ता व सावंत यांनी नेमके प्रश्न विचारले. त्यांची तयारी जाणवत होती. (नंतर आम्ही मुक्ताशी बोललो, तेव्हा तिनं या मुलाखतीसाठी किती आणि कशी तयारी केली होती, हे तपशीलवार सांगितलं.) आम्ही डॉ. बंग यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक होतो. त्यांनी अजिबात निराश केलं नाही. मी डॉ. बंग यांचं नाव प्रथम ऐकलं ते अनिल अवचट यांनी त्यांच्यावर ‘साप्ताहिक सकाळ’च्या (बहुतेक १९९४) दिवाळी अंकात लिहिलेला ‘शोध आरोग्याचा’ हा तपशीलवार लेख वाचला तेव्हा! त्यानंतर २००२ मध्ये मी व संतोष (देशपांडे) आम्ही दोघं गडचिरोलीला डॉ. बंग यांच्या ‘सर्च’ प्रकल्पात आणि पुढं हेमलकसाला डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पात दोन-दोन दिवस राहूनही आलो होतो. डॉ. बंग आणि राणी बंग यांच्याशी गप्पा मारून, त्यांच्यासोबत सकाळी फिरायला जाऊन आम्ही तेव्हा फारच खूश झालो होतो. त्यानंतर बंग यांच्याशी थेट संपर्क काही राहिला नाही. अगदी अलीकडं, म्हणजे २०१९ च्या जानेवारी लोणावळ्यात मनशक्ती केंद्रात शिक्षण परिषद भरली होती, तेव्हा वर्षाच्या (तोडमल) आग्रहास्तव मी खास लोणावळ्याला गेलो होतो, याचं एक प्रमुख कारण म्हणजे तिथं डॉ. अभय बंग येणार होते. तिथं त्यांच्याशी निवांत गप्पा झाल्या. त्यानंतर आता संमेलनात त्यांचे विचार ऐकत होतो. डॉ. बंग शांतपणे, पण ठामपणे आपले विचार मांडत होते. वर्धा परिसरातच त्यांचे वडील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ठाकूरदास बंग यांचं मोठं काम होतं. ते महात्मा गांधी आणि विनोबांच्या नित्य सहवासात होते. त्या प्रभावापासून ते गडचिरोलीत उभारलेल्या ‘सर्च’च्या कामाबद्दल, दारूमुक्तीच्या आंदोलनाबद्दल, विनोबांवर झालेल्या अन्यायाबद्दल ते तपशीलवार बोलले. ‘ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा हे तिघे मराठीतील सार्वकालिक श्रेष्ठ साहित्यिक आहेत,’ असं त्यांनी आवर्जून सांगितलं. बंग यांच्या विचारांतील ठामपणा, स्पष्टपणा त्यांच्या संयमित प्रतिपादनात सहज जाणवत होता. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीतील अनुभव, त्यांतून आलेलं शहाणपण आणि सहज-साध्या संवादातून मोठा विचार मांडण्याची हातोटी यामुळं ही मुलाखत अगदी संस्मरणीय ठरली. 
मुलाखत संपल्यावर मी व यशो थेट व्यासपीठावर गेलो डॉक्टरांना भेटायला... तिथं अर्थात त्यांच्याभोवती गर्दी होती. त्यात वर्ध्यातली स्थानिक मंडळी तर जवळपास सगळीच त्यांच्या ओळखीची! तरीही मी त्यांना भेटून मुलाखत छान झाल्याचं सांगितलं. व्यासपीठावरून खाली उतरलो तर रेणुका देशकर भेटल्या. त्या आणि मुक्ता मैत्रिणी हे समजलं. देशकर यांच्यासोबत फोटो काढले. मंदार तर त्यांच्या आवाजाचा फॅनच झाला होता. नंतर ग्रंथ प्रदर्शनात गेलो. शासकीय मुद्रणालयाच्या स्टॉलवर ‘इथं डिजिटल पेमेंट चालणार नाही; फक्त रोख’ असा बोर्ड लावलेला दिसला. मला ते जरा विचित्र वाटलं. मग त्या बोर्डचा फोटो काढला. नंतर ‘मनोविकास’च्या स्टॉलवर गेलो. तिथं आशिष पाटकर भेटले. माझं ‘सुपरहिरो’ सीरीजमधलं धोनीवरचं पुस्तक तिथं दिसलं नाही. त्याच्या प्रती संपल्याचं कळलं. नंतर शेजारीच ‘मनशक्ती’चा स्टॉल होता. तिथं दीपक अलूरकर आणि सुहास गुधाटे हे दोघं भेटले. तिथंही फोटोसेशन पार पडलं. मग संपूर्ण ग्रंथप्रदर्शनाला एक चक्कर मारली. ऊन बऱ्यापैकी जाणवत होतं. भूकही लागली होती. जेवण झाल्यावर आता आम्हाला सेवाग्रामला जायचं होतं. साधारण आठ किलोमीटर अंतरावर ‘सेवाग्राम’ आहे. तिथं जायला ‘ऑटो’वाल्यानं २०० रुपये सांगितले. आम्ही लगेच निघालो. अर्ध्या तासात तिथं पोचलो. ‘बापू कुटी’च्या समोरच त्यानं आम्हाला सोडलं. ‘सेवाग्राम’विषयी माझी जी कल्पना होती, त्यापेक्षा ही जागा, परिसर थोडा वेगळा निघाला. आत शिरल्यावर तिथल्या दाट झाडांची सावली आणि समोर दिसत असलेल्या झोपड्या यामुळं आपोआप वेगळं वातावरण जाणवू लागलं. मी यापूर्वी दिल्लीत ‘राजघाट’ला दोन-तीनदा गेलो आहे. इथं सेवाग्रामला प्रथमच येत होतो. महात्मा गांधी इथं १९३६ ते १९४६ या काळात राहिले. (तेही सलग नाहीच.) इथं आदिनिवास (सर्वांत आधी बांधलेली एक झोपडी), मग बा कुटी, मग बापू कुटी, महादेव देसाई कुटी, परचुरे शास्त्री कुटी अशा वेगवेगळ्या झोपड्या आहेत. या झोपड्या असल्या, तरी पक्क्या बांधकामाच्या आणि कौलारू आहेत. पहिली झोपडी बांधताना तिचा खर्च शंभर रुपयांपेक्षा अधिक व्हायला नको, अशी बापूजींची अट होती म्हणे. तरीही तिथं बाथटब, कमोड आदी सुविधा तेव्हाच्या काळात होत्या. यात एक टिनचा बाथटब उभा करून ठेवलेला होता, तो जास्तकरून बापूजी वापरायचे. दुसरा एक संगमरवरी बाथटब होता, ते घनश्यामदास बिर्लांनी पाठवला होता. तो लुई फिशर (गांधीजींचे चरित्रकार) वापरत असत, असं तिथं लिहिलं होतं. तिथं एक आधुनिक पद्धतीचा कमोडही होता. बापूजी तो अर्थात स्वत: स्वच्छ करत. तिथला वेळ वाया न घालवता, ते कागदपत्रं बघत. त्यासाठीची एक छोटी रॅक तिथं शेजारीच ठेवण्यात आली होती. या झोपडीची जागा कमी पडू लागली आणि तिथं इतर पुरुषांचा वावर वाढू लागला, तसं जमनालाल बजाज यांनी कस्तुरबांसाठी दुसरी झोपडी उभारण्याची इच्छा व्यक्त केली. बापूंनी नाइलाजाने ती मान्य केली. त्यानंतर स्वत: बापूजींसाठी आणखी एक कुटी उभारण्यात आली. तीत त्यांच्या दैनंदिन वापरातल्या सर्व वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. बापूजींशी संपर्क साधणं शक्य व्हावं म्हणून तत्कालीन गव्हर्नर लिनलिथगो यानं तिथं एक हॉटलाइन बसवली होती. तो फोनबूथही बापूंच्या कार्यालयात होता. याशिवाय त्या परिसरात नित्य साप आढळत. ते बंदिस्त करून ठेवण्याची मोठी पेटी आणि साप पकडण्याचा मोठा लाकडी चिमटाही तिथं होता. (आत फोटोग्राफीला परवानगी नसल्यानं या वस्तूंचे फोटो काढता आले नाहीत.) शेवटच्या काही दिवसांत आजारी असताना बापूजी (आयसोलेशनमध्ये) दुसऱ्याच एका कुटीत राहिले होते. तिच्याबाहेर ‘पागल दौड’ या शीर्षकाखाली बापूजींचे विचार लिहिलेली पाटी लावली आहे. माणूस भौतिक सुखांमागे पळतो आहे आणि खऱ्या सुखांकडे त्याचे दुर्लक्ष होते आहे, अशा आशयाचे ते विचार अगदी आजही सयुक्तिक वाटतात. 

त्या सर्व कुटींच्या आत फोटो काढायला परवानगी नसली, तरी बाहेर फोटो काढता येत होते. आम्ही तिथं फोटो काढले. व्हिडिओही केले. जरा वेळ तिथल्या डेरेदार झाडांच्या सावलीत बसलो. ही झाडं बापूजी हयात असतानाही इथं होती, या विचारानं अंगावर काटा येत होता. त्या वातावरणातल्या लहरी फार पवित्र, शांतवणाऱ्या, स्नेहशील होत्या. ‘महात्मा गांधी नामक एक महामानव या भूतलावर होऊन गेला, यावर पुढच्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत,’ असं अल्बर्ट आइन्स्टाइन गांधीजींच्या मृत्यूनंतर म्हणाले होते. सेवाग्रामच्या त्या परिसरात असताना मात्र वाटलं, त्यांचा हा सर्व इतिहास असा जतन करून ठेवला आहे, की त्या महात्म्याची आठवण तुम्हाला हरघडी व्हावी. सेवाग्राममध्ये अनेक सहली येत होत्या. मुलं चपला-बूट बाहेर काढून बापूंच्या त्या पवित्र वास्तूचं दर्शन घेत होती. अनेक कुटुंबंही मुला-बाळांना घेऊन आलेली दिसली. सर्व जण कुतूहलानं बापूंच्या सगळ्या गोष्टी बघत होते. 
आम्हाला आता तिथून निघायला हवं होतं. तास-दोन तास कसे गेले, ते कळलंही नाही. मुक्ता व यशो आम्हाला तिथंही भेटल्या. त्यांना आता पुण्याला निघायचं होतं. मग त्यांच्यासोबत चहा घेतला. त्याआधी आठवण म्हणून तिथून काही वस्तू खरेदी केल्या. मुक्ता व यशोला बाय करून आम्ही आता पवनार आश्रमाकडे निघालो.
हा आश्रमही तिथून सात-आठ किलोमीटरवर आहे. जवळच्या रस्त्यानं ‘ऑटो’वाल्यानं आम्हाला तिथं नेलं. वर्धा-नागपूर हायवे क्रॉस करून आम्ही धाम नदीच्या तीरावर असलेल्या पवनार आश्रमात पोचलो. आचार्य विनोबा भावे यांच्या दीर्घ वास्तव्यानं पुनीत झालेला हा आश्रम सेवाग्रामच्या तुलनेनं लहान होता. इथं एकच कॅम्पस होता. तिथं आम्हाला गौतम बजाज भेटले. यांच्याविषयी आम्हाला यशोनं सांगितलं होतं. ते आता जवळपास साठ वर्षं याच आश्रमात राहतात. प्रसिद्ध चित्रकार सुजाता बजाज (ज्या आता पॅरिसमध्ये असतात) त्यांची धाकटी बहीण. विनोबांच्या खूप आठवणी त्यांनी सांगितल्या. आम्ही तो आश्रम हिंडून बघितला. मला ‘गीताई’ची प्रत विकत घ्यायची होतीच. ती घेतली. ‘गीता प्रवचने’ हे पुस्तकही घेतलं. बजाज यांच्याशी आम्ही बोलत असताना पुण्यातल्याच आणखी दोन मुली तिथं आल्या. त्याही आमच्यासोबत गप्पा ऐकत थांबल्या. मग त्यांची ओळख झाली. पल्लवी पुरवंत असं त्यातल्या एकीचं नाव. आम्ही सेवाग्राममधून जो ‘ऑटो’ केला होता, तोच आता आम्हाला संमेलनस्थळी सोडणार होता. तो आमच्यासाठी तिथं थांबला होता. मग तिथून निघून अर्ध्या तासात संमेलनस्थळी आलो. भूक लागली होती. म्हणून बाहेरच्या फूड स्टॉलवर जरा चक्कर मारली. तिथं अंबाडी सरबत मिळालं. कोकम सरबतासारखंच लागत होतं. तेव्हा उन्हातून आल्यामुळं त्या सरबतानं जीव अगदी गार झाला. अनेक मंडळी भेटत होती. तिथं मुख्य मंडपात संजय आवटेची भेट झाली. आवटे, मी व मंदार आम्ही २५ वर्षांपूर्वी एकाच दिवशी ‘सकाळ’मध्ये जॉइन झालो होतो. तिघं एकत्र असे खूप दिवसांनी भेटलो. मजा आली. मुख्य मंडपात नागराज मंजुळे, किशोर कदम यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होता. त्यासाठी गर्दी व्हायला लागली होती. मग आम्हीही जागा पकडून बसलो. मुलाखत उशिराच सुरू झाली. आमचे मित्र बालाजी सुतार (आम्ही प्रेमानं त्यांना बासुदा म्हणतो...) सूत्रसंचालनाला होते. त्यात ऐन वेळी सयाजी शिंदेही व्यासपीठावर आले. मग बासुदांसह अरविंद जगताप आणि वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (यांनी मराठीतून आयएएस केले आहे) या तिघांनी नागराज, किशोर व सयाजी यांची मुलाखत एकत्रितपणे सुरू केली. या मुलाखतीसाठी काही पूर्वतयारी किंवा तिघांचे आधी काही बोलणे झाले असावे, असे अजिबात वाटत नव्हते. मुलाखत विस्कळित होत गेली. सयाजी शिंदेंचे वृक्षप्रेम प्रसिद्ध आहे. मात्र, ते दुसऱ्या कुठल्या मुद्द्यावर बोलेनातच. शेवटी नागराज व त्यांचा स्टेजवरच जरासा वाद झाला. आपलं भांडण होईल, असं नागराज त्यांना गमतीत म्हणाला. मग शेवटी ‘आईच्या आठवणी सांगा’ वगैरे विषयांवर मुलाखत आली म्हटल्यावर आम्ही तिथून उठलोच. मुलाखत कशी असावी, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे सकाळची डॉ. बंग यांची मुलाखत होती आणि मुलाखत कशी असू नये, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे ही संध्याकाळची मुलाखत होती. ‘पूर्वतयारी न करता होणारी एकमेव गोष्ट म्हणजे फजिती’ असं पु. ल. देशपांडे म्हणत असत, त्याचीच आठवण झाली.
संध्याकाळी दुसऱ्या मंडपात बासुदांच्या ‘गावकथा’चा प्रयोग होता. मला बासुदा लेखक म्हणून आवडतात. हा प्रयोग कित्येक दिवस बघायचा होता. पण नऊ वाजले तरी त्या छोट्या मंडपात अजून प्रयोगाची तयारी सुरूच होती. मी आत जाऊन बासुदांना भेटलो. त्यांच्या चेहऱ्यावर प्रयोगाचा तणाव स्पष्ट दिसत होता. मी तसं त्यांना म्हटलंही. ‘हा प्रयोग पुण्यात ‘सुदर्शन’ला सर्वाधिक रंगतो,’ असं बासुदांनी सांगितलं. प्रयोग सुरू व्हायला अजून अर्धा तास लागेल, म्हटल्यावर आम्ही जेवायला बाहेर पडलो. आवडते कवी सौमित्रही तिथंच भेटले. मग सेल्फी मस्टच! अर्ध्या तासात आम्ही जेवून आल्यावर मंदारला खरं तर त्या प्रयोगाला थांबायचा कंटाळा आला होता. जवळपास दहा वाजले होते. प्रयोग एकदाचा सुरू झाला. मात्र, थोडी सुरुवात बघितल्यावर आम्ही निघालो. (पुण्यात जेव्हा प्रयोग असेल तेव्हा आता नक्की बघणार...) रूमवर आल्यावर लगेच झोप लागली. दिवसभर दमणूक झाली होती; पण सेवाग्राममधली ती ‘पागल दौड’ शीर्षकाची पाटी सतत डोळ्यांसमोर येत राहिली...


....

रविवार. वर्ध्यातला तिसरा दिवस. सहा फेब्रुवारी. लतादीदींचं प्रथम पुण्यस्मरण. मोबाइलमध्ये ‘रंगोली’ लावली. आज दीदींची गाणी असणार, ही अपेक्षा होतीच. ‘रंगोली’नंही अपेक्षाभंग न करता चांगली गाणी लावली होती. काहीही न करता, डोळे भरून यायला लागले. शेवटी चष्मा ओला व्हायला लागला. तेव्हा तो बाजूला ठेवूनच उरलेली गाणी बघितली. मग आवरून मी व अभिजित ‘आरंभ’मध्ये चहा घेऊन आलो. आज सकाळी फार घाई नव्हती, तरी नाश्त्यासाठी संमेलनस्थळीच जावं लागणार होतं. मग तिघंही ‘ऑटो’ करून निघालो. नेहमीचाच ‘ऑटोवाला’ होता, त्यामुळं नुसतं आत जाऊन बसायचं. तो बरोबर संमेलनाच्या प्रवेशद्वारावर आणून सोडायचा. सकाळी मला ‘सकाळ’मधली एके काळची सहकारी आर्टिस्ट गौरी सावळे-संत हिचा फोन आला होता. तिच्या मुलाचा बालसाहित्य मंचावरील एका कार्यक्रमात सहभाग होता. त्यामुळे ती त्याला घेऊन आली होती.
आम्ही संमेलनस्थळी पोचल्यावर आधी नेहमीप्रमाणे नाश्ता केला. आज इथला शेवटचा दिवस होता, त्यामुळं इथला तो प्रसिद्ध गोरसपाक (दुधात केलेली कणकेची, ड्रायफ्रूट्स असलेली हँडमेड बिस्किटं) घ्यायला आम्हाला मगन संग्रहालयात जायचं होतं. मग चालतच तिकडं निघालो. तिथं गेलो तर रविवारमुळं ते संग्रहालय व गोरस भांडार बंद असल्याचं कळलं. आम्ही कपाळाला हात लावला. कुठल्याही स्थानिक माणसानं आम्हाला ही सर्वांत महत्त्वाची माहिती दिलीच नव्हती. अगदी आम्ही रस्त्यानं मगन संग्रहालयाचा पत्ता विचारत होतो, तेव्हाही लोक पत्ता सांगत होते, पण ते आज बंद असल्याचं कुणीही सांगितलं नाही. (हे मगन असं नाव का आहे, याचा खुलासा संध्याकाळी वर्धा स्टेशनवर झाला. तिथं वर्ध्याची माहिती देणारा मोठा फलक आहे. त्यात महात्मा गांधींचे चुलत भाऊ व सामाजिक कार्यकर्ते मगनलाल गांधी यांच्या नावाने हे संग्रहालय असल्याची माहिती लिहिली आहे.) संग्रहालय बंद असलं, तरी शेजारचं ‘रसोई’ हे रेस्टॉरंट सुरू होतं. इथं नक्की जेवा, असं आम्हाला अनेकांनी सांगितलं होतं. अर्थात आम्हाला संमेलनस्थळीच जेवायचं असल्याचं आम्ही तिथं जेवलो नाही, तो भाग वेगळा! मग समोर एक वर्धिनी नावाचं बचत गटांची उत्पादने विकणारं एक दालन होतं. तिथं गेलो. दारातच सासणे सर भेटले. त्यांच्या ‘सौ.’ तिथं आल्या होत्या. त्यांची मात्र भेट होऊ शकली नाही. आम्ही ‘वर्धिनी’त काही जुजबी खरेदी केली. मात्र, गोरसपाक न घेताच जावं लागणार की काय, अशी परिस्थिती उद्भवली होती. मग तिथं काम करणाऱ्या बायकांनी आम्हाला ‘इंगोले चौकात जा, तिथं अनेक दुकानांत गोरसपाक मिळेल,’ असंं सांगितलं. शेवटी एक ‘ऑटो’वाला गाठला व त्याला इंगोले चौकात जायचंय, असं सांगितलं. आम्हाला गोरसपाक हवाय म्हटल्यावर तो म्हणाला, की तुम्ही मुख्य भांडारात गेला होतात का? आता आम्हाला मुळात असं काही मुख्य आणि उप भांडार आहे हेच माहिती नव्हतं. हा ऑटोवाला पूर्वी गोरस भांडारातच काम करायचा. त्यामुळं त्याला सगळं ठाऊक होतं. त्यानं रिक्षा वळवली आणि आतल्या बाजूच्या एका रस्त्यानं त्या मुख्य भांडारापाशी नेली. तेही बंदच होतं. मात्र, तिथं समोरच त्यांचं एक आउटलेट सुरू होतं. मग तो आम्हाला तिथं घेऊन गेला. तिथं अखेर तो गोरसपाक मिळाला एकदाचा. काही मोजकीच पाकिटं शिल्लक होती. बाकी सगळा माल संपला होता. मग आम्ही एकेक पाकीट घेतलं. नंतर तिथलं दूधही प्यायचं होतं. पंधरा रुपयांना चांगला मोठा ग्लास भरून ते धारोष्ण, अमृतसम दूध समोर आलं. तिथलाच मिल्क ब्रेड घेऊन, दुधात बुडवून मग मी व अभिजितनं त्यावर चांगलाच ताव मारला. दूध प्यायल्यावर तर पोट भरल्याचीच भावना झाली. हे आउटलेट अगदी छोटंसं होतं. हे लोक हातानं हा सगळा माल तयार करतात. त्यामुळं खूप मोठ्या संख्येनं तो तयार होत नाही. तयार झालेला माल लगेच संपतो. त्यात सध्या संमेलनानिमित्त वर्ध्यात पाहुण्यांची प्रचंड गर्दी झाल्यामुळं तर तो संपणार होताच. एकूणच पुण्यातल्या प्रसिद्ध दुकानाची आठवण यावी, असंच या मंडळींचं वर्तन होतं. अर्थात क्वालिटी उत्तम होती, यात वाद नाही. मात्र, जास्त बिस्किटं तयार करावीत, संमेलनात त्याचा वेगळा स्टॉल ठेवावा, असं काही कुणाच्या मनात आलेलं दिसलं नाही. उलट संमेलनाच्या बाहेर असलेल्या स्टॉलमध्ये या मगन संग्रहालयाचाही एक स्टॉल होता. तिथं नंतर चौकशी केली तर, तिथल्या माणसानं जवळपास जीभ बाहेर काढून, कानाची पाळी पकडून, ‘आम्हाला तो (गोरसपाक) इथं विकायला अलाउड नाही,’ असं सांगितलं. ही विरक्ती भलतीच चमत्कारिक होती. असो.

आम्ही पुन्हा संमेलनस्थळी आलो आणि दारातच आम्हाला डॉ. बंग भेटले. आम्ही लगेच त्यांच्याकडे धाव घेतली. फोटो काढले. ते खरं तर गाडीत बसायला निघाले होते, पण आम्ही आमची ओळख दिल्यावर ते आमच्याशी गप्पा मारत बसले. मी पूर्वी ‘सर्च’मध्ये येऊन गेल्याचं त्यांना सांगितलं, त्यावर ‘आता पुन्हा या’ असं आमंत्रण त्यांनी तिथल्या तिथं दिलं. डॉ. राणी बंग सध्या ‘ब्रेन हॅमरेज’नं आजारी आहेत. मात्र, महिनाभरात त्या पूर्ण बऱ्या होतील, असंही डॉक्टरांनी सांगितलं. आदल्या दिवशीच्या मुलाखतीचा विषय अर्थातच निघाला. सुमित्रा भावे विनोबांवर सिनेमा करणार होत्या, तो विषयही मंदारनं काढला. अनेक विषयांवर गप्पा मारून मग डॉक्टर आमचा निरोप घेऊन तिथून गेले.
जरा वेळ मुख्य मंडपातला गांधीजी व विनोबांवरचा कार्यक्रम ऐकत, हवा खात बसलो. सत्राचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे बोलत होते. तो कार्यक्रम संपल्यानंतर गौरीला फोन केला. ती, तिचे यजमान व मुलगा शार्दूल बालसाहित्य मंचाच्या मंडपात होते. मग तिथं जाऊन त्यांची भेट घेतली. शार्दूलला शुभेच्छा दिल्या. नंतर दुपारचं जेवण घ्यायला भोजन कक्षाकडे गेलो. तिकडं जाताना ‘नागपूर मटा’ची सगळी टीम व अपराजित सर भेटले. मग पुन्हा एकदा फोटोसेशन झालं. भोजन कक्षात जेवण झाल्यावर सकाळच्या परिसंवादातले वक्ते व माझे फेसबुक फ्रेंड प्रशांत धर्माधिकारी भेटले. त्यांच्याबरोबर गप्पा झाल्या. ठाण्याच्या वृंदा टिळक व भागवत मॅडम (वृत्तनिवेदक मिलिंद भागवत यांच्या पत्नी) यांची ओळख झाली. जरा वेळानं निघालो. आता थेट हॉटेलवर जाऊन जरा पडावं व मग संध्याकाळची ट्रेन पकडायला बाहेर पडावं, यावर आमचं तिघांचंही एकमत झालं. मग संमेलनस्थळ सोडून आम्ही हॉटेलवर परतलो. आवराआवरी करण्यात जरा वेळ गेला. थोडा वेळ खरोखरच पडलो. साडेपाचला उठून पुन्हा सगळं आवरलं आणि हॉटेल सोडून बाहेर पडलो. चहा घ्यायचा होता, पण ते अमृततुल्य बंद होतं. मग रिक्षा करून स्टेशनवर गेलो. या वेळी त्या शहराचा आकार-उकार जरा लक्षात आला. स्टेशनच्या बाजूला जमनालाल बजाज यांचा पुतळा होता. पुढं तिथली मोठी मंडई लागली. त्या दिवशी तिथला बाजारही होता. भरपूर गर्दी होती. स्टेशनवर पोचल्यावर डावीकडं माघी पौर्णिमेचा भला मोठा चंद्र दिसला. त्याचे फोटो काढले. स्टेशनवर मिलिंद जोशी भेटले. तेही परत पुण्याला निघाले होते. आमच्यानंतर त्यांची ट्रेन होती. आमची ट्रेन पंधरा मिनिटं उशिरा आली. मग वर्ध्याचा निरोप घेऊन बरोबर साडेसातला आम्ही निघालो. येतानाचा प्रवास तसा नेहमीच कंटाळवाणा होतो. सुदैवानं रात्री झोप लागली. सकाळी नगरच्या पुढं ट्रेन आली तेव्हा जाग आली. दौंड कॉर्डलाइन स्टेशनला गाडी थांबली, तेव्हा खाली उतरून छान चहा घेतला. गाडी बरोबर नऊ वाजता वेळेत पुण्यात पोचली. तासाभरात घरी पोचलो. एकदम श्रम जाणवले.
वर्ध्याच्या आठवणींचा कोलाज मात्र हा थकवा घालवायला पुरेसा होता. ‘पागल दौड’ कमी करायची, हा निर्धार करण्यासाठीची शिकवण देणारा हा दौरा चांगलाच लक्षात राहील. इति लेखनसीमा!


---

(उत्तरार्ध)

---

7 Feb 2023

वर्धा डायरी - पूर्वार्ध

वरदेच्या तीरी, शारदेच्या दारी...
-------------------------------------


गेल्या वर्षी वर्ध्याला साहित्य संमेलन घोषित झालं, त्याच वेळी तिथं जायचं असं मी ठरवून टाकलं होतं. चार-पाच वर्षांपूर्वी मी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. त्यात सहज शक्य असूनही आयुष्यात अजूनही न घडलेल्या गोष्टी अशी एक रँडम यादी केली होती. त्यात महाराष्ट्रातील कोणती जिल्ह्याची ठिकाणं मी अजून बघितलेली नाहीत, असा एक उल्लेख होता. त्यात धुळे, भंडारा, वर्धा वगैरे शहरं होती. त्यातलं वर्धा आता बघता येणार होतं. याशिवाय वर्धा म्हटलं, की अपरिहार्यपणे आठवणारे सेवाग्राम व पवनार आश्रम हे दोन्ही बघण्याची संधीही सोडण्यासारखी नव्हतीच. हल्ली आपल्यामागं एवढे व्याप वाढले आहेत, की असं ठरवून वर्ध्यासारख्या ठिकाणी आपण जाणं जवळपास अशक्यच. मग साहित्य संमेलनाचं निमित्त बरं पडतं. संमेलनही अनुभवता येतं आणि पूर्वी कधी न पाहिलं गेलेलं ते शहरही! महाराष्ट्राबाहेर झालेल्या घुमान व बडोदा या दोन संमेलनांना मी, अभिजित पेंढारकर व अरविंद तेलकर असं आमचं त्रिकुट गेलं होतं. नंतर नाशिकमध्ये २०२१ च्या डिसेंबरमध्ये (करोनानंतर झालेल्या) साहित्य संमेलनाला मी व मंदार (कुलकर्णी) असे आम्ही दोघं गेलो होतो. मी, मंदार व अभिजित एकत्रित अजून कुठल्याच संमेलनाला गेलो नव्हतो. म्हणून मग या वेळी दोघांना आवर्जून विचारलं आणि दोघंही तयार झाले. वर्ध्याला जाण्यासाठी रेल्वेच सोयिस्कर असल्यानं मी नोव्हेंबरमध्येच तिकिटं काढून ठेवली. नागपूरला जाण्यासाठी पुण्याहून पुणे-नागपूर सुपरफास्ट व पुणे-नागपूर गरीबरथ अशा दोन थेट गाड्या आहेत. त्यांची वेळही सोयिस्कर होती. या गाड्या एकाआड एक दिवशी धावतात. आम्हाला जाताना पुणे-नागपूर मिळाली, तर येताना गरीबरथ! दोन्ही गाड्यांचं थ्री-टायर एसीचं बुकिंग करून टाकलं. (‘गरीबरथ’मध्ये सर्व डबे थ्री-टायर एसीचेच असतात.)
फेब्रुवारी जवळ येत चालला, तसे वर्ध्याचे वेध लागले. जानेवारीच्या अखेरीस आमच्या नागपूर ऑफिसमधले सहकारी मनोज मोहिते आणि आमचे तेथील संपादक श्रीपाद अपराजित यांच्याशी मी संपर्क साधला. दोघांनीही यथायोग्य मार्गदर्शन करून वर्ध्यात आमची सोय केली. लगेच पैसे भरून हॉटेलही बुक करून टाकलं. (कारण वर्ध्यातील हॉटेलची संख्या आणि येणारे पाहुणे यांचं प्रमाण व्यस्त होतं. त्यामुळं ऐन वेळी हॉटेलमध्ये रूम मिळतीलच याची खातरी नव्हती.) एक फेब्रुवारीला बजेट असतं. तो दिवस ऑफिसमध्ये भरपूर कामाचा असतो. दोन तारखेपासून मात्र माझी रजा होती आणि ट्रेन संध्याकाळची होती. त्यामुळं गुरुवारी सकाळी जरा तयारी करायला वेळ मिळाला.
दोन तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता ही ट्रेन पुण्याहून निघाली. हल्ली ट्रेननं प्रवास फारसा होत नाही. त्यातही मंदार तर जवळपास दहा वर्षांनी ट्रेननं प्रवास करत होता. मीही करोनाकाळानंतर प्रथमच ट्रेननं प्रवास करत होतो. आता सगळंच ‘नॉर्मल’ झालं असल्यानं तसा काहीच प्रॉब्लेम आला नाही. ट्रेनमधल्या खाण्याचा धसका घेऊन आम्हाला घरूनच डबा देण्यात आला होता. तो आम्ही इमाने-इतबारे साडेआठ वाजता खाल्ला. एसी ट्रेन असली, की बाहेरचं फार काही नीट बघता येत नाही. त्यातही या ट्रेननं पुणं सोडल्यानंतर तासाभरातच अंधार झाला. मला ती दौंडची कॉर्ड लाइन बघण्यात इंटरेस्ट होता. पूर्वी सर्व गाड्या दौंड जंक्शनला जाऊन पुन्हा उलट नगरच्या दिशेनं वळायच्या. (म्हणजे पुढचं इंजिन काढून ते मागं लावलं जायचं.) त्यात हमखास अर्धा तास मोडत असे. आता हा बायपाससारखा रूट केल्यानं दौंड जंक्शनला न जाता आणि इंजिन न बदलता थेट नगरकडं गाड्या जातात. हा बायपास दौंडच्या बराच अलीकडं असेल असं मला वाटत होतं. प्रत्यक्षात तो जवळपास दौंडमध्येच आहे. त्यामुळं अंतर फारसं वाचलेलं नाही. मात्र, ट्रेनचा उलट वळसा टळला आहे, हे खरंच. मला एकूणच ट्रेनमध्ये एका जागी बसायला आवडत नाही. मात्र, थ्री टायर एसी हा जरा कंजेस्टेड प्रकार आहे. त्यातही हल्ली बहुतेक हे सगळे डबे फुल्ल असतातच. प्रत्येक प्रवाशाची तऱ्हा निराळी. आपण ग्रुपनं प्रवास करत असलो, तर मजा येते. एरवी एकट्याला बोअर होतं. अनेक जणांना संध्याकाळ झाली, की अंथरूण-पांघरूण पसरून लगेच गुडुप झोपी जायचं असतं. लाइट चालू ठेवावा की नाही, फॅन (एसी असला तरी) लावावा की नाही, यावरून बारीकसारीक कुरबुरी होत असतात. लोक एकूण रागरंग बघून ॲडजस्ट करतात हे खरं. मंदारनं पत्त्यांचा कॅट आणला होता आणि आम्ही कित्येक वर्षांनी त्या रेल्वेत ‘५-३-२’ खेळलो. मात्र, समोरच्या मावशींनी ‘लाइट बंद करा’चा धोशा लावला होता. त्यामुळं खेळ आटोपता घ्यावा लागला. मधला बर्थ लावणं, त्यावर बेडशीट पसरणं आणि ती नीट पसरणं हा एक कार्यक्रमच असतो. त्यातही वरच्या बेडवर बेडशीट घालणं कर्मकठीण. हे सगळे व्याप करून, जीन्स पॅंट आणि शर्टवर तिथं झोपणं हे एक दिव्यच असतं. अनेक लोक रेल्वेत घालायचे वेगळे कपडे आणतात. ते खरं तर योग्य आहे. माझ्या खिशातली नाणी तर हमखास पडतात. अनेक सव्यापसव्य करून अखेर आम्ही तिथं आडवे झालो. माझी रोजची झोपण्याची वेळ एक ते दीड आहे. त्यामुळं सव्वादहाला पडून काय करणार, हा प्रश्नच होता. ‘वागले की दुनिया’ बघून झाली, गाणी ऐकून झाली, तरी झोप येईना. त्यात खालच्या काकांनी वरचा ‘घो’ लावला होता. त्यांच्या घोरण्यामुळं माझी झोप भयानक उडालीच. अखेर केवळ रेल्वेच्या लयबद्ध गतीशी शरीरानं समझोता केला आणि झोप लागली.

सकाळी लवकरच जाग आली तेव्हा बडनेरा जवळ आलं होतं. ‘व्हेअर इज माय ट्रेन’ या ॲपमुळं सगळी बित्तंबातमी कळते, हे एक बरंय. सकाळचा चहा झाला. गाडी थोडी लेट होती. साडेसातच्या ऐवजी आम्ही आठ वाजून २० मिनिटांनी वर्धा स्टेशनला पोचलो. आम्ही बहुतेक मुख्य दाराने बाहेर न पडता, दुसऱ्या एका गेटनं बाहेर पडलो. तिथं अगदी एक की दोनच रिक्षा दिसत होत्या. अखेर पुढं जरा चालून मुख्य रस्त्यावर आलो आणि रिक्षा केली. आमचं ‘विद्यादीप रिजन्सी’ हे हॉटेल तिथून साधारण तीन किलोमीटरवर होतं. रिक्षावाल्यानं शंभर रुपये सांगितले. हा इथला ठरलेला रेट होता तिघांसाठी, हे नंतर कळलं. आम्हाला हॉटेलवर पोचायची घाई होती, कारण संमेलनाचं उद्घाटन सकाळीच होतं. बहुतेकदा ते संध्याकाळी असतं. आम्हाला हॉटेलकडं जातानाच्या रस्त्यावरच ग्रंथदिंडी दिसली. मी लगेच व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं. हॉटेलवर पोचलो. हॉटेलवाल्यानं सगळे पैसे भरा, असं सांगितलं. आधी खोल्या बघून आलो. बऱ्या होत्या. मग सगळे पैसे भरले आणि एकदाचे रूमवर पोचलो. आवरून लगेच संमेलनस्थळी गेलो. मुख्य प्रवेशद्वारावर महात्मा गांधींचा चरख्यावर सूत काततानाचा कटआउट लावला होता. एकूण ते मैदान भव्य दिसत होतं. उद्घाटनाला मुख्यमंत्री येणार होते, त्यामुळं पोलिसांची उपस्थितीही बरीच होती. आम्ही साडेदहाला तिथं पोचलो असलो, तरी उद्घाटन समारंभ सुरू व्हायला वेळ होता. मग आधी पोटोबाची व्यवस्था करायला भोजन कक्षाकडं गेलो. तिथं तीन दिवसांचे नाश्ता, दोन्ही वेळचं जेवण असे प्रत्येकी दोन हजार रुपये भरले आणि आधी ती कुपनं ताब्यात घेतली. ब्रेकफास्ट केला. भूक लागली होतीच. खाऊन, चहा घेऊन मुख्य मंडपात येऊन बसलो. उद्घाटन समारंभ सुरू झाला. स्वागतगीत, मराठी अभिमानगीत, मग एकेक भाषणं असं करत प्रमुख पाहुणे हिंदी साहित्यिक विश्वनाथ प्रसाद तिवारी आणि कुमार विश्वास यांची भाषणं झाली. कुमार विश्वास यांना केवळ पाचच मिनिटं देण्यात आली होती, असं त्यांनीच भाषणात सांगितलं. अर्थात त्यांच्या छोटेखानी भाषणातही त्यांनी जोरदार बॅटिंग करून टाळ्या मिळविल्या. विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते यांचं भाषण प्रभावहीन झालं. ते बऱ्यापैकी तणावातच वाटले. तीच गोष्ट स्वागताध्यक्ष दत्ता मेघे यांची. ते आजारी होते, त्यामुळं बसूनच बोलले. मात्र, त्यांच्या बोलण्यातलं एक अक्षरही कळलं नाही. त्याऐवजी त्यांचं भाषण कुणी तरी वाचून दाखवलं असतं, तर बरं झालं असतं. असो. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू झालं, तेव्हा बारा वाजून गेले होते. त्यांच्या भाषणाच्या वेळी वेगळा विदर्भ आणि पिकांना भाव या दोन मागण्यांसाठी काही लोकांनी गोंधळ केला. पोलिसांनी त्यांना त्वरित बाहेर काढलं. मात्र, नंतर दुसरी बॅच घोषणा द्यायला उठायची. असं एकूण तीनदा झालं. नाही म्हटलं तरी त्या मंडपात अस्वस्थता पसरली. लोक उठून उभे राहिले आणि तिकडं बघू लागले. थोड्या वेळानं स्थिरस्थावर झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी जोरदार बॅटिंग केली. अर्थात, भाषण विस्कळितच होतं. कदाचित, व्यत्यय आल्यामुळं मुद्दाम ते अधिक वेळ बोलले असावेत. मात्र, त्यांचं भाषण संपताच मंडपातले एकदम निम्मे-अधिक लोक उठले आणि बाहेर पडले. संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर थोडाच वेळ बोलणार होते. नंतर त्यांच्या भाषणावर विशेष परिसंवाद ठेवण्यात आला होता. तरीही त्यांचं ते छोटंसं भाषणही त्या बाहेर पडणाऱ्या गर्दीच्या गोंगाटात हरवून गेलं. एवढ्यात गणेश (मतकरी) आला. त्याचा एक परिसंवादात सहभाग होता. मी त्याला आमच्या शेजारी बसायला बोलावून घेतलं. थोड्या वेळानं उद्घाटन समारंभ संपला. तोवर जेवणाची वेळ झाली होती. (या उद्घाटन समारंभाचं सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी प्रभावीपणे केलं. नंतर त्यांच्याशीही भेट झाली.)

संमेलनाचा मुख्य मंडप भव्य होता. शेजारी चार ते पाच लहान मंडप होते. मुख्य मंडपाला आचार्य विनोबा भावेंचं नाव देण्यात आलं होतं, तर मुख्य व्यासपीठाला प्राचार्य राम शेवाळकर यांचं नाव देण्यात आलं होतं. इतर मंडपांपैकी एका मंडपाला विदर्भ साहित्य संघाचे नुकतेच कालवश झालेले अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचं नाव देण्यात आलं होतं. गझल कट्ट्याला अर्थातच सुरेश भट यांचं नाव होतं. ग. त्र्यं माडखोलकर यांच्या नावाने प्रकाशन मंच होता. तिथं कुणालाही आपलं पुस्तक प्रकाशन करण्याची सोय होती. कोपऱ्यात एक मावशी केळकर वाचन मंच होता. पलीकडे विजयराज बोधनकर यांनी काढलेल्या साहित्यिकांच्या अर्कचित्रांचं प्रदर्शन होतं; तसंच वर्ध्यातील स्थानिक छायाचित्रकारांच्या फोटोचंही एक प्रदर्शन होतं. या सर्व लहान मंडपांच्या समोरच ग्रंथप्रदर्शन होतं. पुस्तकाच्या आकाराची दोन भव्य प्रवेशद्वारं होती. एरवी पुस्तक प्रदर्शनांतील गाळे आडव्या-उभ्या सरळ ओळींत असतात. इथं मात्र वेगळी रचना होती. पूर्ण गोलाकार असे स्टॉल होते आणि मधोमध दोन ते तीन ओळींतही काही स्टॉल होते. ही रचना वैशिष्ट्यपूर्ण असली, तरी दिवसभरात सूर्याच्या दिशेनुसार, कुठल्या ना कुठल्या स्टॉलवर ऊन येत होतं. नंतर मग बऱ्याच स्टॉलवर ऊन झाकणाऱ्या कनाती लावलेल्या दिसल्या. या सर्व व्यवस्थेच्या मागच्या बाजूला भोजनकक्ष होता. मुख्य मंडपापासून तिथपर्यंत जायचं तर बऱ्यापैकी चालावं लागत होतं. आम्ही पुस्तक प्रदर्शनात संतोषच्या (देशपांडे) ‘स्टोरीटेल’च्या स्टॉलला भेट देऊन पुढं जेवायला गेलो. जेवणाची कुपन दिल्याशिवाय मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेशच दिला जात नव्हता. त्यामुळं आत फक्त जेवणाऱ्या मंडळींचीच गर्दी होती. जेवणाची व्यवस्था उत्तम होती. स्थानिक पदार्थही होते. जेवण झाल्यावर आम्ही जरा वेळ मुख्य मंडपात येऊन बसलो. तेव्हा आमची ‘नागपूर मटा’ची सगळी टीम भेटली. मनोज मोहिते, विनोद वाघमारे, मुंबईहून आलेली अनुजा चवाथे यांना भेटलो. नागपूरच्या वर्षा किडे-कुलकर्णी फेसबुकवरच्या फ्रेंड. त्यांचीही भेट झाली. जर्नालिझमचा बॅचमेट मनोज भोयर आणि पुण्यात पूर्वी ‘लोकमत’मध्ये असलेला निनाद देशमुख हेही भेटले.
आज संध्याकाळच्या वेळी गीताई मंदिर बघून यावं असं ठरलं. आमचा मित्र आशिष तागडे कालच तिथं जाऊन आला होता. त्याची पोस्ट मंदारनं बघितली होती. मग तिकडंच जाऊ या, असं ठरलं. रिक्षा करून चारच्या सुमारास तिकडं गेलो. त्या परिसराला गोपुरी असं नाव आहे आणि गीताई मंदिर असलेल्या त्या भागाला गोपुरी आश्रम असंच म्हणतात, हे तिकडं कळलं. रिक्षानं आम्हाला तिकडं सोडल्यावर आम्ही आत गेलो. एकदम शांत परिसर होता. ती शांतता मनाला स्पर्शून गेली. आत गेल्यावर कळलं, की जमनालाल बजाज यांचं वास्तव्य इथं होतं. त्यांच्या स्मृती त्या बंगल्यात नीट जतन करून ठेवल्या आहेत. शेजारी ‘विनोबा दर्शन’ नावाचं विशेष प्रदर्शन होतं.

जमनालाल बजाज विनोबांना गुरू मानत होते. त्यामुळंच गुरूंची स्मृती शेजारीच उत्कृष्ट प्रदर्शनाद्वारे जतन करण्यात आली होती. आत फोटो काढायला परवानगी नव्हती. जमनालाल बजाज यांनी एका फोर्ड गाडीचं रूपांतर बैलगाडीत केलं होतं आणि तिला ‘ऑक्स-फोर्ड’ असं नाव दिलं होतं. निळ्या रंगाची ती एका बैलाची गाडी बाहेरच होती. तिचा मात्र फोटो काढता आला. नंतर आम्ही गीताई मंदिराकडं गेलो. मंदिरासारखं जवळपास काही दिसेना. तेव्हा तिथल्या व्यवस्थापकांनी सांगितलं, की हे मंदिर म्हणजे विनोबांनी लिहिलेल्या ‘गीताई’तील ओळी लिहिलेल्या पाषाणशिल्पांचा समूह! आम्ही ते पाषाण बघायला गेलो आणि थक्क झालो. साधारण दोन ते तीन मीटर उंचीच्या पाषाणांवर ‘गीताई’तील अध्यायानुसार श्लोक कोरले होते. अध्याय बदलला, की वेगळ्या रंगांचे पाषाण असायचे. असे एकूण सातशेहून अधिक पाषाण तिथं उभारले होते. हे ‘गीताई मंदिर’ बघून आम्ही थक्क झालो. धन्य वाटलं... मी मंदारला उत्स्फूर्तपणे तिथं ‘फेसबुक लाइव्ह’ करण्याची कल्पना सुचविली. त्याला व अभिजितलाही ती कल्पना आवडली. मग आम्ही तिघांनी तिथूनच एक ‘फेसबुक’ लाइव्ह केलं.

शेजारीच एक विश्वशांती स्तूप होता. त्याच्या आधी एक जपानी प्रार्थना मंदिर होतं. विनोबांच्या काळात तिथं आलेल्या एका जपानी साधूबुवांनी (त्यांचं नाव विसरलो) इथं बरंच काम केलं होतं म्हणे. त्यांच्याच नावाने हे प्रार्थना मंदिर होतं. आत कुणीही नव्हतं. अगदी शांत अन् प्रसन्न वाटलं. आजूबाजूचं भान हरपलं अक्षरश:! दोन मिनिटं तिथं मौन उभा राहिलो आणि बाहेर पडलो. विश्वशांती स्तूपही भव्य होता. त्या परिसरातून बाहेर पडताना संध्याकाळ झाली होती. पाखरांची किलबिल होती. सुंदर डांबरी रस्ता आणि शेजारी पदपथही होता. वर्ध्यातली मंडळी बहुतेक तिथं संध्याकाळी चालायला येत असावीत. कारण आम्ही परत येत असताना तसे बरेच लोक दिसले. रिक्षासाठी आम्हाला बरंच चालून थेट मुख्य रस्त्यावर यावं लागलं. तिथं बऱ्याच वेळानं एक रिक्षा मिळाली. तिथून थेट संमेलनस्थळी आलो. बाहेर काही खाण्याचे स्टॉल होते. तिथं चक्कर मारली. संमेलनाध्यक्षांच्या भाषणावरचा परिसंवाद अजून सुरूच होता. तिथं थोडा वेळ थांबलो. तो परिसंवाद संपल्यानंतर गणेशचा सहभाग असलेला ‘आम्हा लेखकांना काही बोलायचे आहे’ हा परिसंवाद (जवळपास तीन तासांनी उशिरा) सुरू झाला. सुरुवातीला पी. विठ्ठल बोलले. नंतर गणेश बोलला. त्यानं ते लिहूनच आणलं होतं. त्याचं बोलणं झाल्यावर आम्ही तिथून उठलो. मुख्य मंडपात श्रीपाद अपराजित सर भेटले. पुढच्या परिसंवादात त्यांचा सहभाग होता. आमच्याकडे ‘मैफल’ पुरवणीत लिहिणाऱ्या रश्मी पदवाड-मदनकर यांचीही भेट झाली. आम्ही तोवर केवळ फेसबुकवरच भेटलो होतो. अचानक भेट झाल्यानं आनंद झाला. त्यानंतर जेवायचं होतं. बराच उशीरही झाला होता. रात्रीचं जेवण झाल्यावर फार न रेंगाळता बाहेर पडलो आणि रिक्षा करून, नव्हे ‘ऑटो’ करून हॉटेलवर पोचलो.

हा पूर्वार्ध संपवताना हा ‘रिक्षा’ व ‘ऑटो’चा किस्सा सांगितलाच पाहिजे. रात्री हॉटेलवर जाताना मंदारच्या तोंडून ‘रिक्षा’ असा उल्लेख ऐकून आमचा रिक्षावाला भयंकर अपसेट झाला. त्यानं तसं स्पष्ट बोलून दाखवलं. ‘मी एवढे पैसे घालून ऑटो घेतला आणि तुम्ही त्याला रिक्षा म्हणून राह्यले,’ ही त्याची खंत होती. मंदारला तर काय झालं ते कळेनाच. माझ्या लक्षात आलं. इकडं ‘रिक्षा’ म्हणजे सायकलरिक्षा आणि ‘ऑटो’ म्हणजे आपण इकडं जिला ‘रिक्षा’ म्हणतो ती... मी हे मंदारला सांगितल्यावर आता वर्ध्यात असेपर्यंत तरी ‘रिक्षा’ला ‘ऑटो’च म्हणायचं, असं आम्ही स्वत:ला ‘ऑटो-करेक्ट’ करून घेतलं.
साहित्य संमेलनाच्या मंडपाबाहेर आपल्या मायमराठी भाषेनं आमची अशी फिरकी घेतली होती आणि ‘जे सहित घेऊन जातं ते साहित्य’ ही (बहुतेक विनोबांनी केलेली) व्याख्या मनापासून पटली... वर्ध्यातल्या गोड पाहुणचाराचा पहिला दिवस असा भाषेचा धडा शिकवून संपला होता...!


(ता. क. वर्धा शहर हे वर्धा नदीच्या तीरी वसलं आहे. या नदीचं खरं नाव ‘वरदा’ असं आहे. अपभ्रंश होऊन वर्धा झालं आणि शहराचं नावही तेच पडलं.)


(पूर्वार्ध)

उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-------




28 Jan 2023

दोन नाटकं - दोन छोटी टिपणं...

१. काजव्यांचा गाव
---------------------

आतून उजळविणारा...
---------------------------


सुदर्शन रंगमंच इथं नाटक पाहायचा फायदा म्हणजे इथं तुम्ही नाटकाचाच एक भाग होऊन जाता. वास्तविक शुभांगीताई (दामले) मला कित्येक दिवस नाटक पाहायला बोलावताहेत. पण मला संध्याकाळची वेळ जमत नसल्यानं ते राहूनच जात होतं. अखेर तो योग आला. खूप दिवसांनी इथं परवा (रविवारी) एक नाटक पाहिलं आणि हा नाटकातलंच होऊन जाण्याचा अनुभव दीर्घ काळानं घेतला. ‘काजव्यांचा गाव’ हे ते नाटक. प्रदीप वैद्य सर्वेसर्वा असलेलं हे नाटक पाहणं म्हणजे एक ‘आतून उजळवून टाकणारा’ अनुभव आहे.
कोकणातल्या एका छोट्या गावात - जिथं २००८ मध्येही अजून लोडशेडिंगमुळं कंदिलांचा वापर करावा लागतो - तिथं राहणाऱ्या दीक्षित यांच्या घरात घडणारी ही गोष्ट आहे. या दीक्षितांच्या घरातली सर्वांत ज्येष्ठ व्यक्ती असलेल्या आजींच्या सहस्रचंद्रदर्शनाचा घाट तिच्या दोन मुलींनी घातला आहे. यातली एक मुलगी पुण्यात असते, तर एक अमेरिकेत ‘निघून’ गेलेली असते. आजींना दोन मुलं आहेत. एक चिपळ‌ुणात राहतो, तर एक आजींसोबत त्या गावातच राहतो व शेती-वाडी करतो. याशिवाय अजून एक अविवाहित मुलगीही तिथंच राहते आहे. आजींची नातवंडंही आहेत. काही तिथंच राहतात, तर एक नात पुण्याहून आली आहे. तिचा मित्रही सोबत आला आहे.
मग नाटकातले प्रसंग उलगडतात जातात तसतसे या वरवर एकसंध, सुखी दिसणाऱ्या कुटुंबातले लहान-मोठे अंधार आपल्याला दिसू लागतात. नाटकात होणाऱ्या फेड-इन, फेड-आउटप्रमाणे आपल्याही मनात या अंधार-प्रकाशाचा खेळ सुरू होतो. नात्यांचं आभासीपण लख्ख दिसू लागतं. कोरड्या हिशेबांसाठीचे रोकडे भाव जाणवू लागतात. एकीकडं लहान मुलांमधला निरागस भाव आणि दुसरीकडं मोठे होऊन व्यावहारिक अन् अलिप्त झालेले सगळे मोठे यांचा हा समांतर प्रवास आपल्यासमोर साकारू लागतो. आपल्या मनाला कधी धडका देत, तर कधी गोंजारत, कधी रागवत, तर कधी मायेनं हे नाटक आपल्या जवळ येतं... जुन्या मित्राशी चांदण्या रात्री हक्कानं गप्पा मारीत बसावं, तसं गुजगोष्टी सांगत बसतं.
मुळात हे नाटक समीपनाट्य या प्रकारातलं आहे. म्हणजे प्रेक्षकांच्या मधेच हे नाटक घडतं. पात्रं आपल्यामधून ये-जा करतात. अशा प्रकारचं नाटक पाहताना एक विलक्षण तद्रूपता लागते. त्यामुळं मोजक्या आणि जाणत्या प्रेक्षकांसमोरच याचे प्रयोग होऊ शकतात. ‘सुदर्शन’ला हे शक्य आहे. तिथल्या रंगमंचाच्या अवकाशाचा योग्य वापर करून घेऊन नाटककार हे नाट्य आपल्या सभोवती रचतो. कलाकारांच्या हालचाली, त्यांच्यातला परस्परांमधला मेळ आणि प्रेक्षकांची भावावस्था यांची उत्कृष्ट एकतानता अशा वेळी अनुभवता येते. कलाकार आपल्या अगदी जवळ येऊन अभिनय करीत असल्यानं त्यांच्या चेहऱ्यावरची रेष अन् रेष, प्रत्येक भाव आपल्याला दिसत राहतात. खरं तर अशा परिस्थितीत अभिनय करणं हे अत्यंत आव्हानात्मक आहे. ते या नाटकातल्या सगळ्याच कलाकारांनी साधलंय, याचं विशेष कौतुक!
विशेष उल्लेख करायचा तो ताई झालेली रूपाली भावे, प्रतिभा झालेली मधुराणी आणि आजी झालेल्या राधिका हंगेकर यांचा. आशिष वझे आणि निखिल मुजुमदारही उत्कृष्ट. रूपाली आणि तिच्या भावाचा एक दीर्घ संवाद खासच! मधुराणीनं ‘प्रतिभा’ खूपच प्रभावीपणे साकारली. शांता झालेल्या सायली सहस्रबुद्धेंनी तिचा त्रागा चांगला दाखविलाय. मुलांमध्ये फिट येणारा गणेश साकारणाऱ्या गंधार साळवेकरनं विशेष दाद मिळविली. श्वेता झालेल्या मुक्ता सोमणकडं भविष्यातली ‘मुक्ता बर्वे’ म्हणून पाहायला हरकत नाही. या मुलीवर लक्ष ठेवायला हवं. कासिम आणि गुरुजी अशी दोन पात्रं साकारणाऱ्या समीर जोशीचा ठसका मस्तच! वसुधा झालेल्या प्रिया नेर्लेकरांचा इंटेन्स अभिनयही भिडला. बाकी सर्व कलाकारांनी पूरक व उत्तम साथ दिली. स्मिता तावरे यांची वेशभूषा व आशिष देशपांडे यांची रंगभूषाही उल्लेखनीय. या सर्वांनाच झी आणि मटा गौरव पुरस्कारांत विविध नामांकनं मिळाली आहेत. त्यामुळं त्यांच्या कर्तृत्वावर जाणकारांचं आधीच शिक्कामोर्तब झालंय.
हे नाटक आहे ते प्रदीप वैद्य यांचं. लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश व संगीत अशी पंचरंगी कामगिरी त्यांनी यात केलीय. या नाटकावर महेश एलकुंचवारांच्या वाडा नाट्यत्रयीचा प्रभाव जाणवतो. हे ‘वाडा’चं कोकण व्हर्जनही वाटू शकेल. अर्थात त्यानं बिघडत काही नाहीच!
थोडक्यात, एक उत्कट, सच्चा नाट्यानुभव घ्यायचा असेल, तर ‘काजव्यांच्या गावा’ला जाण्याशिवाय पर्याय नाही. नाटकाच्या ‘समीप’ जाण्याची ही एक उत्तम संधी आहे.

(२६ मे २०१९, फेसबुक पोस्ट)

------

२. अडलंय का?
-----------------

हो... अडलंय!
----------------

निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘अडलंय का?’ या नाटकाचे प्रयोग सध्या सुरू आहेत. हे नाटक सर्वांनी आवर्जून बघावं. मराठी रंगभूमीवरचे एक दमदार अभिनेते-दिग्दर्शक, प्रायोगिक नाट्यचळवळीचे आधारस्तंभ अतुल पेठे व त्यांची कन्या पर्ण पेठे हे दोघे यात काम करतात. चार्ल्स लेविन्स्की या नाटककाराच्या ‘दी बेझेटझुंग’ (दी ऑक्युपेशन) या मूळ नाटकाची रंगावृत्ती पेठे पिता-पुत्री आणि निपुणने तयार केली आहे. (भाषांतराचे श्रेय शौनक चांदोरकर यांचे.) सलग दीड ते पावणेदोन तास चालणारा हा दीर्घांकच आहे. एका नाट्य कलावंताचं आणि त्या नाट्यगृहासाठीचं नगरपालिकेचं बजेट कमी करायला आलेल्या एका महिला प्रशासन अधिकाऱ्याचं संभाषण यातूनच हे नाट्य फुलत जातं.
दोनच कलावंत कायम रंगमंचावर असल्यानं प्रेक्षकांना खिळवून ठेवायची सर्व जबाबदारी या दोघांवरच आहे. अतुल पेठे यांनी यातील अभिनेता साकारला आहे, तर महिला अधिकाऱ्याची भूमिका अर्थातच पर्णनं केली आहे. नाटकाचा जवळजवळ पहिला अर्धा भाग अतुल पेठे एक वेगळा, काहीसा कर्कश वाटणारा आवाज लावून बोलतात. (त्यामागचं कारण आपल्याला नंतर कळतं.) पण त्या आवाजात सतत जवळपास एक तास बोलणं हे किती थकवणारं काम आहे! मात्र, पेठे त्यांच्यातल्या अभिनेत्याला पूर्णपणे कामाला लावतात आणि त्याच्याकडून अक्षरश: अंगमेहनत करवून घेतात. दुसऱ्या बाजूनं या अभिनेत्याच्या विविध विक्षेपांनी आधी दचकणारी, घाबरणारी; मात्र एकदा त्याचे हे उद्योग लक्षात आल्यावर ठामपणे त्याला सामोरी जाणारी महिला अधिकारी पर्णनंही तितक्याच तोलामोलानं साकारली आहे.
कलेचं आपल्या (सार्वजनिक) आयुष्यातलं नक्की स्थान काय, या मूलभूत विषयावर नाटकात चिंतन होतं. ते पुष्कळसं सटल आहे. मात्र, तो अंत:प्रवाह आपल्याला सतत जाणवत राहील याची काळजी दिग्दर्शकानं निगुतीनं घेतली आहे. विशेषत: अलीकडच्या दोन वर्षांत करोनाकाळात आपण या कलाप्रकारांना किती प्राधान्याचं स्थान दिलं होतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर नाट्यगृह राहिलं पाहिजे, चाललं पाहिजे यासाठीचा हा झगडा फारच सूचक वाटतो. नाटक-सिनेमावाचून तुमचं काही अडलंय का? असं विचारणाऱ्यांना ठामपणे ‘हो, अडलंय’ असं सांगणारी ही नाट्यकृती आहे. नाटक-सिनेमाला श्वास मानणाऱ्या आपण सगळ्यांनी ती बघितलीच पाहिजे.

(१७ मे २०२२, फेसबुक पोस्ट)

------

9 Jan 2023

‘नज़र अंदाज़’विषयी...

नजरेपलीकडचे दाखवणारा...
----------------------------------

नुकताच ‘नेटफ्लिक्स’वर ‘नज़र अंदाज़’ हा हिंदी चित्रपट पाहिला. अतिशय आवडला. साध्या माणसांच्या जगण्यातलं साधं-सरळ तत्त्वज्ञान सांगणारा हा चित्रपट प्रत्येकानं आवर्जून पाहावा. कुमुद मिश्रा, दिव्या दत्ता व अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे तिन्ही कलाकार अलीकडच्या काळात हिंदी सिनेमांतून काहीशा दुय्यम भूमिकांतून आपल्याला सतत दिसत आले आहेत. मात्र, विशेषत: वेब सीरीज आल्यानंतर त्यांच्यातल्या अभिनयक्षमतेची जाणीव आपल्याला अधिक प्रकर्षानं झाली असं म्हणता येईल. कुमुद मिश्रा हा गुणवान अभिनेता अनेक हिंदी चित्रपट व वेब सीरीजमधून दिसतो. अलीकडे ‘डॉ. अरोरा’ ही त्याची वेब सीरीज बघितली होती व अतिशय आवडली होती. अभिषेक बॅनर्जी हा अभिनेतादेखील अनेक सिनेमांतून व वेब सीरीजमधून दिसला आहे. दिव्या दत्ता या दोघांच्या तुलनेत अधिक सीनिअर आणि जास्त नाव असलेली अभिनेत्री आहे. 
या तिघांना एकत्र आणून ‘नज़र अंदाज़’सारखा वेगळा चित्रपट तयार होईल, असं खरोखर वाटलं नव्हतं. मात्र, दिग्दर्शक विक्रांत देशमुख यानं ही किमया घडवून दाखविली आहे. इथं मला हे सांगितलं पाहिजे, की हा चित्रपट बघताना मला विक्रांतसाठी अतिशय मनापासून आनंद होत होता. याचं कारण म्हणजे हा विक्रांत उर्फ विकी माझा मित्र आहे. पुण्यात ‘सकाळ’मध्ये रुजू झाल्यावर बॅचलर लाइफचा काही काळ मी भाऊमहाराज बोळातील ओक वाड्यात कॉट बेसिसवर राहून काढला आहे. (काळ १९९७ ते २००३ दरम्यान...) विकी तेव्हा तिथंच आमच्यासोबत राहत होता. त्याचे बाबा तेव्हा खोपोलीला नोकरी करत होते आणि विकी शिकण्यासाठी पुण्यात राहत होता. तेव्हापासून मी विकीला बघतो आहे. नंतर तो मुंबईला गेला. चित्रपटसृष्टीत काम करत राहिला. नंतर त्याची प्रगती समजत राहिली, पण मधला काही काळ अजिबात संपर्क नव्हता. मात्र, व्हॉट्सअपमुळे तो पुन्हा संपर्कात आला. ओक वाड्याचा ग्रुप तयार झाला आणि सगळे मित्र पुन्हा भेटले. असो.
सांगायचा मुद्दा, या जवळच्या माणसानं स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला हिंदी चित्रपट आला, म्हणून अतिशय आनंद झाला. तो मला थिएटरला जाऊनच बघायचा होता. मात्र, तेव्हा काही कारणांनी ते झालं नाही. ‘नेटफ्लिक्स’वर तो सिनेमा आल्यावरही माझ्याकडून लगेच काही बघणं झालं नाही. मात्र, परवाच्या रविवारी अखेर हा सिनेमा बघितला आणि लगेच त्यावर लिहायचं ठरवलं. सिनेमा आवडलाच. मित्रानं केलेला म्हणून थोडा अधिकचा ‘बायस’ असेलही; पण माझ्याआधीच फेसबुकवर काही जाणकारांनी आवर्जून हा सिनेमा बघा, असे चांगले रिव्ह्यू लिहिल्याने मलाच अधिक आनंद झाला. असो.
‘नज़र अंदाज़’ ही आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या साध्या-सोप्या जगण्याची, त्यातल्या साध्या-सोप्याच पेचांची, अडचणींची, दुविधेची कहाणी आहे. परमेश्वर सर्वांच्या पदरात नशिबाचं सारखं माप टाकत नाही. प्रत्येकाचं नशीब वेगळं आणि आयुष्याची वाटचालही भिन्न... अशा तीन भिन्न नशिबांची, भिन्न स्वभावांची तीन माणसं काही कारणपरत्वे एकत्र येतात. आपला नायक सुधीर (कुमुद मिश्रा) अंध आहे. जन्मापासूनच अंध असल्यानं त्यानं हे जग पाहिलेलंच नाही. अर्थात त्याचे बाकीचे ‘सेन्सेस’ अधिक तीव्र असतात. योगायोगाने त्याची गाठ एका भुरट्या चोराशी (अभिषेक बॅनर्जी) पडते. तो त्याला चांगलं वागण्याच्या अटीवर स्वत:च्या बंगल्यात घेऊन येतो. त्याला अली असं नाव देतो. भवानी (दिव्या दत्ता) ही सुधीरकडे काम करणारी त्याची मदतनीस असते. वेगवेगळ्या कारणांनी सुधीरच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून असणारे हे दोघं एकमेकांचा अडथळा दूर करायचा प्रयत्न करायला लागतात.
सुधीरचा एक इतिहास आहे. त्याला मृत्युपत्र करायचं आहे. त्याआधी त्याला या दोघांना घेऊन मांडवी या त्याच्या मूळ गावी जायचं आहे. मग हे तिघं साइडकार असलेल्या स्कूटरवरून प्रवासाला निघतात. प्रवासादरम्यान बऱ्याच गमती-जमती होऊन अखेर हे मांडवीला पोचतात. तिथं पोचल्यावर त्यांना सुधीरची एके काळची प्रेयसी भेटते. ती आता त्याच्या मित्राचीच बायको असते. सुधीरला तिला भेटून अतिशय आनंद होतो. आता अली आणि भवानी यांचं सुधीरबद्दलचं मत बदलू लागतं. त्याच्या आयुष्यातील एक त्रुटी दूर करण्यासाठी ते त्याला कच्छच्या रणात घेऊन जातात... त्यानंतर काय होतं हे प्रत्यक्ष चित्रपटात बघणंच योग्य.
दिग्दर्शक विक्रांत देशमुख आणि प्रसिद्ध छायाचित्रकार-दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची ही कथा आहे. विक्रांतच्या डोक्यात चित्रपटाचा प्रवास अगदी पक्का आहे आणि त्यानं तो फोकस अजिबात हलू दिलेला नाही. कुमुद मिश्राच्या अभिनयक्षमतेला पूर्ण वाव देणारी ही भूमिका आहे आणि या अभिनेत्यानंही तिला पूर्ण न्याय दिला आहे. अंध व्यक्तीच्या सर्व लकबी, हावभाव त्यांनी अगदी बरोबर उचलल्या आहेत. या भूमिकेसाठी त्यांच्या दाताची रचना काहीशी बदलली आहे आणि त्यामुळे त्या काहीशा अवघड अशा तोंडाच्या पोझिशनसह त्यांना संपूर्ण सिनेमाभर वावरावं लागलं आहे. बहुतांश सिनेमांत सुरुवातीला जो माणूस अंध दाखवतात, तो मुळात अंध नसतोच आणि अंध असण्याचं नाटक करत असतो, असा शेवटी (‘धक्कादायक वगैरे’) उलगडा होत असतो. या सिनेमातही तसंच होतं की काय, अशी मला भीती वाटत होती. परंतु विकीच्या ‘नो नॉनसेन्स’ स्वभावावर विश्वासही होता. अखेर तो विश्वास सार्थ ठरला आणि नायकाला शेवटी अचानक डोळेबिळे आले नाहीत. अभिषेक बॅनर्जी हाही ताकदीचा कलाकार आहे. त्याला तुलनेत फार वाव नव्हता. उलट दिव्या दत्ताने भवानीची भूमिका नेहमीच्या ठसक्यात केली आहे. 
चित्रपटातील दोन-तीन प्रसंगांचा विशेष उल्लेख करावा लागेल. मांडवीत सुधीर आपल्या जुन्या घरात जातो आणि त्याला आईची आठवण येते तेव्हाचा प्रसंग आणि संवाद खास आहेत. अगदी डोळ्यांत पाणी आणणारे! दुसरा प्रसंग आहे तो सुधीर आणि त्याची प्रेयसी भेटतात तो... हा प्रसंग अगदी जमून आला आहे. राजेश्वरी सचदेवनं ही छोटीशी भूमिका अगदी लक्षात राहण्यासारखी केली आहे. त्या प्रसंगातला तिचा मुद्राभिनय खास! 
तिसरा प्रसंग आहे तो कच्छच्या रणातला. त्याविषयी इथं फार काही सांगता येत नाही, मात्र तो प्रसंग सिनेमॅटोग्राफर राकेश सिंह यांनी कमालीचा सुंदर टिपला आहे. विशाल मिश्रा यांचं संंगीत आहे. काही काही गाणी जमून आली आहेत. मात्र, त्यांचे शब्द माझ्या तरी लक्षात नाहीत. 
एकूण, हा न चुकता घेण्यासारखा अनुभव आहे. चित्रपटाचा शेवट चटका लावणारा आहे. माणुसकीवरचा आपला विश्वास वाढवणारा... 
माझ्यासाठी, मित्राविषयीचा अभिमान आणखी वाढवणारा...
नक्की बघा.

---

दर्जा : साडेतीन स्टार

---


13 Dec 2022

दमण-मुंबई डायरी - उत्तरार्ध

मुंबई मेरी जान...
---------------------


तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दमण सोडलं. तिथल्या एक सोमनाथ मंदिरात आम्हाला जायचं होतं. हे मंदिर वापीच्या बाजूला वाढलेल्या दमण शहरात होतं. वापी आणि दमण हे जोड-शहर आहे, हे त्या भागात गेल्यावर कळलं. मधे फक्त एक कमान आहे. ती ओलांडली, की आपण वापीत - म्हणजेच गुजरातमध्ये - प्रवेश करतो. तिथून अहमदाबाद-मुंबई महामार्गही अगदी जवळ आहे. आम्ही त्या महामार्गावर पोचलो आणि उजवीकडं वळलो. समोर जाणारा रस्ता सिल्व्हासाकडे जाणारा होता. आम्ही तिथंही जाणार होतो. मात्र, तिथलं एक आदिवासी संग्रहालय बंद असल्याचं समजलं आणि एका लायन सफारीबद्दल फार काही चांगले रिव्ह्यू ‘गुगल’वर नव्हते. सिल्व्हासा परिसरात मोठमोठे कारखाने आणि उद्योगधंदे आहेत. महामार्गावरून मुंबईकडं निघाल्यावरही ते दिसलं दोन्ही बाजूंनी... आम्हाला भूक लागली होती. अखेर एक बरं हॉटेल बघून गाडी थांबवली. तिथं भरपूर ट्रक थांबले होते. तो ट्रकवाल्यांचा नेहमीचा अड्डा असणार. आम्ही तिथं जाऊन आलू पराठे ऑर्डर केले. मैद्याच्या पोळीचे, शंकरपाळ्यांसाठी जसे आकार कापतात, तसे कापलेले तुप्पाळ आलू पराठे समोर आल्यावर आम्हाला हसावं की रडावं तेच कळेना. त्यासोबत चक्क फोडणीचं वरण दिलं होतं. मग लक्षात आलं, ट्रकवाल्यांचा हा आवडता आहार असणार. भुकेपोटी खाल्ल्यावर वाटलं, एवढाही काही वाईट नव्हता. चहा मात्र झकास मिळाला. 
तिथून पुढं गाणी ऐकत, गप्पा मारत प्रवास झाला. आता ठाण्याऐवजी आम्हाला सरळ मुंबईत शिरायचं होतं. मी पहिल्यांदाच एवढ्या उत्तरेकडून मुंबईत शिरत होतो. तिथंही तो डोंगराळ भाग लागला. तो ओलांडल्यावर आम्ही एकदम मीरा-भाईंदरमध्ये आलो. उंचच उंच इमारतींनी आपण मुंबईत असल्याचं दाखवून दिलं. तिकडं मेट्रोची कामंही सुरू होती. ट्रॅफिक जॅम लागला हे वेगळं सांगायला नको. रस्त्यात एके ठिकाणी पेट्रोल भरायला थांबलो. पण तिथं कार्ड चालत नव्हतं, म्हणून केवळ पाचशे रुपये रोख देऊन तात्पुरतं पेट्रोल भरलं. नंतर पुढं भरू म्हणत आम्ही थेट मुंबईत आलो. आता पेट्रोल संपलं होतं व तातडीनं भरायचं होतं. मात्र, आम्हाला एकही पेट्रोलपंप दिसेना. अखेर गोरेगावात डाव्या बाजूला पंप मिळाला आणि आम्ही हुश्श केलं. आमचं वेस्ट एंड हॉटेल थेट दक्षिण मुंबईत (बॉम्बे हॉस्पिटलसमोर) होतं. पेट्रोल पंपापासूनही एक तास अंतर दाखवत होतं. मग साईनाथकडं गाडी दिली. हळूहळू अंधेरी, वांद्रे करीत सागरी सेतूमार्गे आम्ही दक्षिण मुंबईत शिरलो. सकाळी निघाल्यापासून बरोबर पाच तासांनी आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो होतो.

हॉटेल अगदीच बॉम्बे हॉस्पिटलच्या समोर होतं. हेरिटेज टाइप वाटत होतं. आम्ही रूम ताब्यात घेतल्या आणि जरा आवरून लगेच जेवायला बाहेर पडलो. तसा हेवी ब्रंच झालेला असल्यामुळं फार भूक नव्हतीच. हॉटेल शेजारीच एक लिबर्टी नावाचं उपाहारगृह होतं. तिथं जाऊन पुरी-भाजी, पावभाजी, सँडविच या टाइप प्रत्येकानं काही ना काही खाल्लं. इथून आम्हाला क्रॉफर्ड मार्केटमध्ये जायचं होतं. मी मुंबईत अनेकदा आलो असलो, तरी क्रॉफर्ड मार्केटमध्ये भटकलो नव्हतो. मग आम्ही चौघंही संध्याकाळी साडेचार-पाचपासून तिथं मनमुराद भटकलो. जाताना चालतच गेलो. मेट्रो सिनेमावरून (वासुदेव बळवंत फडके चौक) जाताना ‘२६-११’ची आठवण आली आणि पाठीतून थंड लहर गेली. त्या चौकात वासुदेव बळवंतांचा एक दणकट अर्धपुतळा आहे. हा मी पाहिला नव्हता. चालत निघाल्यानं सगळं बारकाईनं बघता आलं. क्रॉफर्ड मार्केटमध्ये अपेक्षेप्रमाणे तोबा गर्दी होती. मात्र, स्वस्तात मस्त वस्तूंचं आमिषही मोठं होतं. तिथं मनाजोगती खरेदी झाल्यावर आम्हाला चहा घ्यायचा होता. मग तिथं कामत नावाचं एक हॉटेल होतं, तिथं जाऊन झकास चहा घेतला. (हे विठ्ठल कामत नव्हेत, गौतम कामत... हे त्यांचे कुणी आहेत का माहिती नाही...) जाताना एकदम ‘सरदारगृह’ ही पाटी बघितली आणि थबकलो. हे लोकमान्य टिळकांचं मुंबईतलं निवासस्थान. एक ऑगस्ट १९२० रोजी त्यांचं इथंच देहावसान झालं. आत्ता तिथं त्या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर पुढं आलेल्या छतावर त्यांचा अगदी छोटासा अर्धपुतळा बसवलेला दिसला. तो खालून नीट दिसतही नव्हता. समोरून फोटो काढायला गेलो, तर ‘स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ या ओळी आणि टिळकांची थोडी माहिती तिथं कोरलेली दिसली. तिथं फोटो काढले. त्या रस्त्यालाही ‘लोकमान्य टिळक मार्ग’ असंच नाव आहे. टिळक गेले तेव्हा त्यांची त्या काळातली सर्वांत मोठी अंत्ययात्रा मुंबईत तेव्हा निघाली होती. आचार्य अत्रे यांनी त्यांच्या शैलीत (बहुतेक ‘कऱ्हेचे पाणी’मध्ये) त्या अंत्ययात्रेचं (तेव्हा स्मशानयात्रा असा शब्द रूढ होता) भरपूर भावनिक वर्णन केलेलं आहे. गिरगाव चौपाटीवर तेव्हा टिळकांवर अंत्यसंस्कार झाले होते. आता तिथं त्यांचा पूर्णाकृती पुतळा बसवला आहे. (तो बघितल्यावर मला नेहमी अशोक नायगावकरांची ‘टिळक’ ही भन्नाट कविता आठवते.) मला त्या थोड्या क्षणांत हे सगळं आठवलं. टिळकांचा तो उपेक्षित पुतळा बघून जरा वाईट वाटलं. मनोमन नमस्कार केला आणि पुढं निघालो.
आम्ही तिथून गिरगाव चौपाटीला टॅक्सीनं गेलो. जाताना त्या खूप जुन्या फ्लायओव्हरवरून गेलो. मला कधीचं त्या फ्लायओव्हरवरून जायचं होतं. ते अखेर झालं. चौपाटी नेहमीसारखी होती. तिथं ते लोक बसायला चटया भाड्यानं देतात. तीस रुपयाला एक चटई वगैरे. एक जण असाच मागे लागला. तुम्हाला दोन चटया लागतील, म्हणू लागला. आम्हाला हसू आवरेना. त्या ‘चटई क्षेत्रा’वरून भरपूर जोकही करून झाले. मुंबईतली बिचारी प्रेमपाखरं (जागेअभावी) तिथं येऊन बिलगली होतीच. ते सगळं बघत (किंवा तिकडं दुर्लक्ष करतोय असं दाखवत) आम्ही तिथं बसून राहिलो. वृषाली पहिल्यांदा तिथं आली होती. तिला थोड्या वेळानं त्या उडत्या चटया असह्य व्हायला लागल्या आणि आम्ही शेवटी निघालो मग तिथून... चौपाटी म्हटल्यावर भेळ, पाणीपुरी, कुल्फी हे सगळं रीतीप्रमाणे झालं. आमचं हॉटेल तिथून अगदी जवळ होतं. मग त्या सुंदर रस्त्यावरून सगळी मुंबई बघत चालत जाऊ या, असं ठरलं. मात्र, थोड्याच वेळात आमचा भ्रमनिरास झाला. त्या सुंदर मरीन ड्राइव्ह रस्त्यावर चक्क खोदकाम सुरू होतं. कोस्टल रोडच्या कामासाठी ग्रेड सेपरेटरसारखं प्रचंड खणून ठेवलं होतं. ती खणाखणी बघून फार यातना झाल्या. तरीही तिथूनच शेवटी चालत, मरीन लाइन्स स्टेशन क्रॉस करून महर्षी कर्वे मार्गाला लागलो. जाताना एकदम एक स्मशानभूमी लागली. त्यावर ‘जगन्नाथ शंकरशेट स्मशानभूमी’ असं लिहिलं होतं. थोडं पुढं गेल्यावर एक चर्च लागलं. तिथं भिंतीवर बारीक अक्षरात सोनापूर चर्च असं लिहिलेलं मी वाचलं. मग एकदम डोक्यात प्रकाश पडला. मगाशी दिसलेली ती स्मशानभूमी म्हणजे ‘सोनापूर’च! अत्र्यांच्या पुस्तकात याचाही अनेकदा उल्लेख वाचला होता. (दुसऱ्या दिवशी लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे अंत्यसंस्कार याच स्मशानभूमीत झाल्याचं पेपरमध्ये वाचलं.)
साधारण दीड ते दोन किलोमीटर चालत आम्ही हॉटेलवर पोचलो. मुंबईत एरवी मला प्रचंड आणि सतत घाम येतो. या वेळ डिसेंबरमधल्या थंड वातावरणामुळं एवढं चालूनही मला फारसा घाम आला नाही आणि याचा मला प्रचंड आनंद झाला. कारण या कारणामुळं मी मुंबईत चालत सगळं बघायची इच्छा असूनही ते टाळायचो. आता मात्र मला घाम न आल्यानं फारच बरं वाटलं. मुंबईत चक्क थंडी वाजत होती. आमच्या ऑफिसमध्येही चक्कर मारायची माझी इच्छा होती. तेही अंतर असंच चालत जाण्यासारखं होतं. मी आमचे सहकारी राजीव काळे यांना मेसेजही केला. तेही ऑफिसमध्ये होते आणि आनंदानं ‘ये की’ म्हणाले. रात्रीचं सीएसटी स्टेशन बघण्याचं एक आकर्षण होतं. मात्र, हॉटेलवर गेल्यावर दिवसभराचा थकवा एकदम जाणवला आणि बाहेर पडायचा उत्साह मावळला. मग मी त्यांना येत नसल्याचं कळवून टाकलं.
मी मुंबईत एवढ्या वेळा येऊनही घारापुरी लेणी बघितली नव्हती. किंबहुना आम्हा चौघांपैकी कुणीच बघितली नव्हती. त्यामुळं दुसऱ्या दिवशी सकाळी तिकडं जायचं हे नक्की होतं. मग लवकर उठून खाली खाऊ गल्लीत फक्त चहा घेतला आणि थेट टॅक्सीनं ‘गेट ऑफ इंडिया’ला पोचलो. एवढ्या सकाळी इथं येण्याची माझी ही पहिली वेळ होती. लगेच बोटीची तिकिटं काढली आणि बहुतेक तिकडं जाणाऱ्या पहिल्याच बोटीत आम्ही बसलोही. हा साधारण एका तासाचा प्रवास आहे. घारापुरी बेट मुंबई आणि मुख्य भूभागाच्या (उरण वगैरे) यांच्या मधे असल्याने आपण पूर्वेकडे प्रवास करतो. (अनेक वर्षं माझी समजूत गेट वे ऑफ इंडिया हे पश्चिमेकडे तोंड करून असेल, अशी होती. फार नंतर कळलं, की ते पूर्वेकडे तोंड करून आहे.) हा सगळा समुद्राचा आत घुसलेला भाग आहे आणि हा समुद्र अतिशय प्रदूषित आहे. अतिशय मातकट, पिवळसर पाणी दिसतं. त्यात तो सीगल पक्ष्यांना वेफर्स, कुरकुरे खाऊ घालण्याचा कार्यक्रम बोट निघाल्याबरोबर सुरू झाला. अर्थात आम्हीही उत्साहानं त्यांना एक-दोन कुरकुरे टाकले आणि व्हिडिओही काढले. त्या सर्व समुद्रात प्लास्टिकचा भरपूर कचरा तरंगत असल्याचं दिसलं. सीगल पक्ष्यांना मात्र आता कुरकुरे किंवा वेफर्सची चांगलीच सवय झालेली दिसली. त्या समुद्रात जर खोलवर मोठमोठी मालवाहू जहाजं नांगरलेली दिसतात. ‘टग’ बोटींतून सामान उतरवण्याचं कामही अनेक ठिकाणी सुरू असलेलं दिसतं. जसजसं पुढं जाऊ तसं डाव्या बाजूला शिवडी ते न्हावाशेवा या समुद्री महामार्गाचं काम सुरू असलेलं दिसतं. हा महामार्ग अजून दोनेक वर्षांत तयार होईल आणि पुण्याहून दक्षिण मुंबई आणखी जवळ येईल. जवळपास ४०-५० मिनिटं प्रवास केल्यावर उजव्या बाजूला घारापुरी बेट दिसायला लागलं. माझ्या अपेक्षेपेक्षा हे बेट बरंच मोठं आणि डोंगरासारखं होतं. थोड्याच वेळात आमची बोट तिथल्या जेट्टीला लागली. आमची आजच्या दिवसातली पहिलीच प्रवासी बोट होती. आमच्या बोटीत जवळपास १०० लोक तरी असावेत. ते उतरल्याबरोबर तिथल्या सुस्त जीवनात त्या दिवसाची चहलपहल एकदम सुरू झाली. जेट्टीला लागूनच एक टॉय ट्रेन होती. ती चालण्याचं अंतर बऱ्यापैकी वाचवते. पण तेव्हा ती बंद होती. मग आम्ही चालत पुढं गेलो. अगदी सुरुवातीपासून खाण्याचे स्टॉल, दुकानं यांची रेलचेल दिसली. आम्ही एके ठिकाणी थांबून गरमागरम वडापाव, मॅगी, चहा यांचा आस्वाद घेतला. पुढं घारापुरी ग्रामपंचायतीची पाच-पाच रुपयांची एंट्री फी भरून आत शिरलो. साधारण पर्वतीएवढ्या उंचीवर दगडी पायऱ्यांनी वर जायचं होतं. दोन्ही बाजूंनी सलग दुकानं व हॉटेलं होती. त्यांनी ताडपत्र्या टाकून तो सगळा पायऱ्यांचा मार्ग झाकला होता, हे एक बरं झालं. त्यामुळं ऊन लागत नव्हतं. आम्ही रमत-गमत, आजूबाजूचे स्टॉल बघत वर चढतो. नाही म्हटलं तरी थोडी दमछाक झाली. मात्र, वर पोचल्यावर सगळा शीण नाहीसा झाला. गार वारा आणि मागे बघावं तर दूरवर समुद्रच समुद्र असं ते दृश्य फार छान होतं. 

वर गेल्यावर एंट्री फी भरली. आता तिथं बऱ्यापैकी सौंदर्यीकरणाचं काम सुरू आहे. पहिल्याच लेण्यात ती प्रसिद्ध शिवमुद्रा (तीन चेहऱ्यांची) आहे. हे पहिलंच लेणं अद्भुत आहे. अनेक मूर्तींची मोडतोड झालेली आहे. पोर्तुगीजांनी या पाषाणशिल्पांवर गोळीबाराचा सराव केला, असं एक गाइड सांगताना ऐकलं. फार चीड आली... आता या वास्तूला हेरिटेज वास्तूचा दर्जा मिळाला आहे. तिथं बराच वेळ रेंगाळलो. जपानी, कोरियन पर्यटक बरेच दिसले. तिथं माकडंही बरीच होती. तिथं फिरताना एकूण फार शांत वाटलं. पुढेही काही लेणी होत्या. पण पहिल्या लेण्याची सर कुणाला नव्हती. थोड्या वेळानं खाली उतरलो. पायऱ्या उतरताना लागलेल्या एका हॉटेलातच जेवलो. परत येताना मात्र टॉय ट्रेन मिळाली. पाच रुपयांचं तिकीट काढून जेट्टीवर आलो. लगेच बोट मिळाली. जाताना उत्साहात असलेली सगळी मंडळी येताना मात्र डुलक्या काढत होती. जरा ऊनही वाढलं होतं. समुद्राचा पृष्ठभाग सोनेरी रंगानं चमचमत होता. आता एलिफंटाकडे जाणाऱ्या बऱ्याच बोटी दिसत होत्या. हळूहळू ‘गेट वे ऑफ इंडिया’ दिसू लागलं. तासाभरात आम्ही परत इकडे येऊन पोचलो. 
यानंतर जवळपास भटकंती करायची होती. ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ला (एनजीएमए) जायचं ठरवलं. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (रिगल चौक) भव्य आहे. इथं लालबहादूर शास्त्रींचा पुतळा आधीपासून होता. आता बाळासाहेब ठाकरेंचाही पूर्णाकृती पुतळा इथं उभारला आहे. तिसऱ्या आयलंडमध्ये ‘विक्रांत’ या आपल्या पहिल्या विमानवाहू नौकेची भलीमोठी प्रतिकृती ठेवली आहे. तो एक सेल्फी पॉइंटच झाला आहे. ‘एनजीएमए’ बंद होतं. मग म्युझियमवरून जाताना बरीच गर्दी दिसली. कदाचित शाळांची सहल किंवा कुठला तरी कार्यक्रम असावा. त्यामुळं मग म्युझियममध्ये शिरण्याचा मोह टाळला. पुढं ‘जहांगीर’मध्ये मात्र गेलो. तिन्ही प्रदर्शनं बघितली. त्यातलं शहरांवरचं प्रदर्शन मला विशेष आवडलं. तिथं रस्त्यावरच अनेक जण आपली चित्रं लावतात, तेही मला आवडतं. ती चित्रं बघत बराच टाइमपास केला. तिथं रस्त्यावर चहा विकणाऱ्याकडून चहाही घेतला. आता साडेचार वाजत आले होते. मग नरीमन पॉइंटला जायचं ठरवलं. मला खरं तर ‘बेस्ट’ बसनी जायचं होतं. त्यातही डबल डेकरनं! मात्र, त्या रूटवर तशी एकही डबल डेकर नव्हती. मग शेवटी टॅक्सी करून नरीमन पॉइंट गाठला. टॅक्सीवाल्यानं अगदी ‘एनसीपीए’च्या (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स) वास्तूसमोर सोडलं. एनसीपीएची वास्तू बघताच मला विलक्षण आनंद झाला. कारण हेदेखील बऱ्याच वर्षांचं बघायचं राहिलं होतं. आम्ही अर्थात समोर कठड्यावर जाऊन बसलो. शनिवारची संध्याकाळ असल्यानं थोड्याच वेळात गर्दी वाढली. इथून सूर्यास्ताचा अप्रतिम ‘शो’ बघितला. भेळ खाणं, चहा-कॉफी हे जोडीनं झालंच. त्या गर्दीतही खूप शांत वाटत होतं हे नक्की!
सूर्यास्त झाल्यावर तिथून निघालो. मला ‘एनसीपीए’ आतून बघायचं होतं. मला आठवतंय तसं १९८५ की ८६ मध्ये पु. ल. या संस्थेचे संचालक झाले, तेव्हापासून मला या संस्थेचं नाव माहिती आहे. मात्र, ती बघण्याचा योग आज येत होता. इथल्या टाटा थिएटरचीही खूप ख्याती ऐकली होती. आम्ही शनिवारी गेलो, तेव्हा संध्याकाळी साडेसहा वाजता तिथल्या भाभा थिएटरमध्ये उस्ताद झाकिर हुसेन व सतारवादक नीलाद्रीकुमार यांचा कार्यक्रम होता. सहज ‘बुक माय शो’वर पाहिलं. तर आठशे रुपयांपासून तिकिटं होती. अर्थात ‘सोल्ड आउट’ होती. तरी सहज आत जाऊन थिएटरच्या दारात उभे राहिलो. मुंबईतले ‘हूज हू’ म्हणावेत असे लोक आलिशान गाड्यांमधून येऊ लागले. मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जग्वार अशा सगळ्या गाड्या... कुणी तरी सेलिब्रिटी किंवा ओळखीचं कुणी भेटेल, असं उगाच वाटत होतं. पण तसं काही घडलं नाही. 

हळूहळू पूर्ण अंधार झाला आणि मुंबई उजळू लागली. कितीदाही हे झगमगीत रूप बघितलं तरी कंटाळा येत नाही. मला तर व्हिक्टोरियाची सैर करायचाही मोह झाला होता. पण बऱ्याचशा बग्ग्या आता इलेक्ट्रिक ऑपरेटेड झालेल्या दिसल्या. त्यात काही ती गंमत नाही. आम्हाला डिनर ‘कॅफे माँडेगर’मध्ये करायचं होतं. (तेही एक छोटंसं स्वप्न!) मग पुन्हा टॅक्सी करून तिकडं... तिथं ‘वैशाली’समोर असते तशी रांग होती. पण आम्हाला तिथंच जायचं होतं आणि काहीही घाई नव्हती. मग दहा-पंधरा मिनिटांत आत शिरलो. एकदम आत ‘इनसाइड स्टोरीज’मध्ये जागा मिळाली. तिथली ती चित्रं (मिरांडाची असावीत का?), ते म्युझिक, ते लाल ड्रेसवाले आणि अगदी लागून-लागून असलेल्या खुर्च्यांमधून सराईतपणे सर्व्ह करणारे वेटर असा तो एक भारी माहौल होता. इथं शांतपणे (मुंबईच्या तुलनेत) खाणं-पिणं झालं. मन तृप्त झालं. शांतपणे तिथून निघालो. खरं तर रात्री त्या भागातून आणखी चालत फिरायची माझी इच्छा होती. पण शेवटी आम्ही टॅक्सी करून हॉटेलवर परतलो.
दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी हॉटेल सोडलं. रविवारची सकाळ. तिथंच शेजारी ब्रेकफास्ट केला. मी तिथून जी गाडी सोडली ती तीन तासांत थेट घराच्या पार्किंगमध्येच थांबवली. कधी घरी पोचलो ते कळलंही नाही. मधे टोलव्यतिरिक्त कुठेही थांबलो नाही, थांबावंंसं वाटलंही नाही. घराची ओढ तीव्र असतेच! 
आपल्या अगदी रूटीन, व्यग्र दिनक्रमात थोडा ब्रेक गरजेचाच असतो. आम्ही तो पुरेपूर घेतला. दमणला दोन दिवस अगदी वेगळ्या वातावरणात आणि दक्षिण मुंबईत पहिल्यांदाच हॉटेलमध्ये मुक्काम करून वेगळी मुंबई अनुभवली. लक्षात राहिली ती दमणची असीम शांतता आणि मुंबईतल्या गर्दीतही जपता आलेला आपला खासगीपणा... मुंबई शहर मला आवडतं ते यासाठी! 

(उत्तरार्ध)

----

12 Dec 2022

दमण-मुंबई डायरी - पूर्वार्ध

हा सागरी किनारा...
------------------------


कोव्हिडपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये आपल्याकडे जो उठत होता, तो हंपीला जात होता. सोशल मीडियावर हंपीवाल्यांचे फोटो बघून मला न्यूनगंड आला आणि मी तशी पोस्टही टाकली. त्या वर्षी मला हंपीला जायला काही जमलं नाही आणि नंतरची दोन वर्षं तर शक्यच नव्हतं. म्हणून यंदाच्या डिसेंबरमध्ये पहिली संधी मिळताच हंपीला जाण्याचं निश्चित करून टाकलं. माझ्यासह धनश्री, माझा आतेभाऊ साईनाथ आणि त्याची बायको वृषाली असे आम्ही चौघं जाणार होतो. अगदी हॉटेल बुकिंग वगैरे पण केलं होतं. मात्र, अचानक सीमाप्रश्न भडकला आणि जरा काळजी वाटायला लागली. आम्ही आमची कार घेऊन जाणार होतो आणि बेळगावात मुक्काम करून पुढं जायचा विचार होता. पण मग एकूण चिघळती परिस्थिती पाहता दोन दिवस आधी हंपीला जाणं जड अंत:करणानं रद्द करून टाकलं. अर्थात रजा होती, त्यामुळं कुठं तरी जायचं हे ठरलं होतंच. मग स्वाभाविक पर्याय आले ते गोवा किंवा कोकण हेच. मात्र, इथली बहुतेक ठिकाणं बघून झाली होती आणि डिसेंबरमध्ये कोकणात एकूणच हॉटेलांपासून सर्वच सेवा महाग मिळतात आणि कदाचित निकृष्टही! म्हणून मग ते पर्याय बाद झाला. अजून बघितलं नाही अशा ठिकाणी जाऊ या यावर आमचं चौघांचं एकमत झालं होतं. मी मनातल्या मनात महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा नकाशा आणला आणि कोकणातून वर वर जाऊ लागलो. डहाणूच्या परिसरात कुठं तरी जावं असं वाटू लागलं. आणि अचानक डोळ्यांसमोर नाव आलं ते दमणचं. दीव, दमण आणि दादरा-नगर-हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहेत, एवढंच शाळेत शिकलेलो. त्यापलीकडं दमणविषयी फारशी माहिती नव्हती. तिथं समुद्रकिनारा आहे आणि तिथंही पोर्तुगीजांची राजवट होती, म्हणजे गोव्यासारखंच वातावरण असेल असा एक अंदाज होता. याशिवाय दारूबंदी असलेल्या गुजरातमधले अनेक मद्यप्रेमी लोक खास मद्यपानासाठी दमण आणि सिल्व्हासाला येतात, हे ऐकून माहिती होतं. हंपीच्या तुलनेत (पुण्याहून ५६५ किलोमीटर) दमणचं अंतरही (३१३ किमी) पुष्कळ कमी होतं. मुंबईवरून जावं-यावं लागणार होतं, त्यामुळं मुंबईला जाण्याची संधी मी सोडणं शक्यच नव्हतं. शेवटी दमणला दोन दिवस आणि मुंबईत दोन दिवस राहू या, असं ठरवलं आणि तशी हॉटेलची बुकिंग करून टाकली. 
बुधवारी (७ डिसेंबर) दत्तजयंतीच्या शुभमुहूर्तावर सकाळी आठ वाजता आम्ही दमणच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं. ‘श्री दत्त’मध्ये ब्रेकफास्ट करणं आलंच. दत्तजयंती आणि ‘श्री दत्त’ आणि मी श्रीपाद यावर माफक विनोदही करून झाले. तिथं झकास थालिपीठं आणि सुंदर दही मिळाल्यानं मजा आली. चहा घेतला आणि गाडी पुढं दामटली. ठाण्यात शिरल्यावर ट्रॅफिक जॅम लागेल हा अंदाज होताच आणि तसंच झालं. एके ठिकाणी मी सुकाणू साईनाथकडं दिलं आणि वाढत्या ठाण्याच्या विस्ताराकडं डोळे विस्फारून बघू लागलो. मी ठाण्यापर्यंत आलो असलो, तरी इथून पुढचा प्रदेश मला नवा होता. कार घेऊन दिवसा प्रवास करण्यामागे तो प्रदेश बघण्याचा उद्देश होताच. मला स्वत:ला रात्री प्रवास करायला आवडत नाही, ते यासाठीच! ठाण्याच्या बाहेर पडल्यावर टोपोग्राफी एकदम बदलते. डोंगर लागतात. जरासे मातकट आणि धूळभरले! मालवाहू ट्रकची संख्या प्रचंड आणि तुलनेनं रस्ता खराब. वसईच्या खाडीपर्यंत हेच सुरू राहिलं. मुंबईकडून येणारा रस्ता आणि ठाण्याहून येणारा रस्ता जिथं एकत्र मिळतात, तिथं फ्लायओव्हरचं काम सुरू आहे. त्यामुळं हे ट्रॅफिक जॅम होत असल्याचं आम्हाला तिथं पोचल्यावर कळलं. हळूहळू गर्दीतून ती खाडी ओलांडून आम्ही मुंबई-अहमदाबाद महामार्गाला लागलो आणि दमणुकीमुळं लगेच आलेल्या पहिल्याच हॉटेलमध्ये जेवायला थांबलो. काठियावाडी असं नाव असलेल्या त्या हॉटेलात गुजराती पद्धतीचं जेवलो. आम्ही अजून महाराष्ट्रातच असलो, तरी गुजरातचा प्रभाव आजूबाजूच्या हॉटेलांवर दिसू लागला होता. अगदी गुजराती पाट्याही इथूनच सुरू झाल्या. मुंबई-अहमदाबाद रस्ता काही ठिकाणी खराब असला, तरी बराचसा चांगला आहे आणि सहा लेनचा आहे. त्यामुळं इथून पुढं साईनाथनं गाडी सुसाट दामटली. महाराष्ट्राची हद्द बरीच पुढपर्यंत आहे. तलासरी हे मोठं गाव या महामार्गावर लागतं. (माझा ओक वाड्यातला एक मित्र या गावचा. त्याची आठवण आली...) त्यानंतर गुजरात-महाराष्ट्र राज्यांच्या चेकपोस्ट. त्यानंतर अच्छाड हे महाराष्ट्राच्या हद्दीतलं शेवटचं गाव. तिथून पुढे अगदी २०-२५ किलोमीटरवर वापी आहे. दमण हे समुद्रकिनाऱ्यावर असल्यानं १६ किलोमीटर आत डावीकडे आहे. थोड्याच वेळात तो फाटा आला. तिथं लगेच एक रेल्वे क्रॉसिंग लागलं. ते ओलांडून पुढं गेल्यावर दमणचा रस्ता लागला. दमण या केंद्रशासित प्रदेशाची हद्द अगदी पाच किलोमीटर अलीकडं सुरू होते. तो फलक आला आणि एकदम खराब रस्ता लागला. केंद्रशासित प्रदेशाची ही परवड बघून जरा धक्काच बसला. मात्र, पुढं सगळीकडं चांगले रस्ते लागले.

दुपारी चारच्या सुमारास, आठ तासांच्या प्रवासानंतर आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोचलो. हॉटेलच्या परिसरात अजिबात घरं किंवा वर्दळ नव्हती. हे दमण नव्हतंच. दमणच्या जवळ असणारं परियारी नावाचं गाव होतं. त्या गावात आमचं हॉटेल होतं, हे नंतर आम्हाला कळलंच. जांपोर नावाचा इथला बीच आमच्या हॉटेलपासून अगदीच जवळ होता. मग संध्याकाळी तिथं गेलो. समुद्र पुष्कळच आत गेला होता. पौर्णिमा आणि त्यात ओहोटी... मात्र, एवढा आत गेलेला आणि कमालीचा शांत समुद्र मी पहिल्यांदाच बघत होतो. इथले बीच ‘मडी’ (चिखलयुक्त) आहेत, ही माहिती आधी समजली होतीच. त्यामुळं इथं गर्दीही जरा कमी होती. आमची थोडी निराशाच झाली तो बीच बघून... मात्र, बीचलगत बांधलेला रस्ता आणि तिथं उभारलेले दिव्यांचे खांब अगदी आकर्षक होते. इथं एवढी कमी गर्दी बघून आम्हाला खरं तर कसं तरीच होत होतं. आपल्या इथं प्रत्येक पर्यटनस्थळी एवढी गर्दी असते, की बस! त्या तुलनेत इथं गर्दी होती, पण ती फारच किरकोळ! आमच्याकडं गाडी असल्यानं आम्ही तो परिसर जरा पिंजून काढावा म्हणून निघालो. त्या बीचच्या कडेनं केलेल्या सुंदर रस्त्यानं दोन-अडीच किलोमीटर गेल्यावर आम्हाला ‘नानी दमणकडे’ अशी पाटी दिसली. आम्ही लगेच तिकडं गाडी वळवली. थोड्याच वेळात एकदम मोठं गाव लागलं. पेट्रोलपंप, मोठमोठी दुकानं, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि जरा रहदारी हे बघितल्यावर जरा जीवात जीव आला. दमणचे दोन भाग आहेत. एक नानी (म्हणजे छोटं) दमण आणि एक मोटी (म्हणजे मोठं) दमण. यात गंमत अशी, की प्रत्यक्षात नानी दमण हे मोठं आहे आणि मोटी दमण लहान. अर्थात मोटी दमणकडं असलेली एक भव्य गोष्ट लवकरच आम्हाला दिसणार होती. आम्ही त्या रस्त्यानं जरा पुढं गेलो तर एक भव्य, दगडी, आडवी भिंत लागली. एखाद्या धरणाची असावी अशी ती महाकाय भिंत कशाची असावी, याचा विचार करू लागलो तोच दिसलं, की हा तर दमणचा प्रसिद्ध सेंट जेरोम किल्ला आहे. आम्ही लगेच गाडी त्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत घेतली. समोरच एक रणगाडा ठेवलेला होता. किल्ल्याच्या भिंतीवर तीव्र प्रकाशझोत सोडले होते. सभोवती नीट राखलेली हिरवळ होती. आम्ही तिथं भरपूर फोटो काढून घेतले. किल्ल्याच्या भोवती एक चक्कर टाकली. या किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचं काम २०१९ मध्ये झाल्याचा फलक तिथं लावला आहे. किल्ल्याच्या आत दमण नगर परिषदेचं कार्यालय आणि इतर सरकारी कार्यालयं आहेत. अगदी शेवटी गेल्यावर दीपगृहाकडं जाणारा रस्ता दिसला. मात्र, संध्याकाळ झाल्यामुळं तिथला प्रवेश बंद झाला होता. आम्ही तिथून परत फिरलो. पुढं जाऊन डावीकडं वळलो तर दमणगंगेवरचा पूल लागला. या नदीमुळंच दमणचे हे दोन भाग पडले आहेत. समुद्राच्या मुखाजवळचा भाग असल्यानं नदीत भरपूर पाणी होतं. हा पूल ओलांडून पुढं गेल्यावर नानी दमणमध्ये जरा फिरलो. तिथंच एक कुट्टी नावाचं दाक्षिणात्य रेस्टॉरंट होतं. तिथं चांगलं जेवण मिळालं. रात्री रमतगमत हॉटेलवर आलो. तोवर भरपूर गाड्या येऊन पार्क झालेल्या दिसल्या. एकूण परियारीतलं आमचं हे हॉटेल बरंच लोकप्रिय असावं असा अंदाज आला. हॉटेल चांगलंच होतं. रात्री तिथल्या हिरवळीवर गप्पा मारत बसलो. 
दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्याच हॉटेलमधला काँटिनेंटल ब्रेकफास्ट घेतला. बाहेर पडल्यानंतर आधी देवका बीचला जायचं ठरवलं. तो बराच दूर होता. पण तिथं गेल्यावर बरंच नवं काम सुरू असलेला कोस्टल रोड दिसला. पण तो स्पॉट इतका भारी होता, की फोटोशूटला पर्याय नव्हताच. मग रील्स, फोटोशूट असं सारं साग्रसंगीत भर उन्हाचं करून झाल्यावर तिथून जवळच असलेल्या मीरासोल गार्डन या ठिकाणी गेलो. 

आपल्या सारसबागेसारखं, पण जरा छोटं असं हे ठिकाण आहे. एक सुंदर तळं आणि मधोमध रेस्टॉरंट अशी रचना आहे. तिथं बोटिंग, टॉय ट्रेन पण होत्या. आम्ही तिथं पेडल बोटिंग केलं. भर दुपारी त्या तळ्यात हे बोटिंग करणारे आम्हीच (वेडे) होतो. पण २० मिनिटं पेडलिंग करून व्यायामही झाला आणि मजाही आली. मग तिथंही भरपूर फोटो झाले. त्याच कोस्टल रोडवरून येताना समुद्राला भरती आलेली दिसली आणि आमच्याही आनंदाला भरती आली. आता समुद्र बीचच्या पुष्कळ जवळ आला होता. आम्ही एके ठिकाणी गाडी थांबवली आणि तिथं जाऊन एकदाचे पाय भिजवले. नंतर तो रस्ता संपेपर्यंत प्रवास केला आणि डाव्या बाजूला एकदम एक छोटा, गढीसारखा किल्ला दिसला. हा नानी दमण फोर्ट. मग तिथं गाडी लावून आत गेलो. आत एक चर्च आहे. एका शाळेचा काही तरी कार्यक्रम होता, त्याची तयारी सुरू होती. आम्ही त्या किल्ल्याच्या बुरुजांवरून चारी बाजूंनी एक चक्कर मारली. आता उन्ह जाणवत होतं. भूकही लागली होती. मग बाजारपेठेत जरा चौकशी करून एका हॉटेलात गेलो. तिथं गुजराती थाळीची ऑर्डर दिली. भूक लागल्यामुळं आम्ही चौघंही त्या थाळीवर तुटून पडलो. मस्त जेवण झालं. तिथून मग पुन्हा त्या मोठ्या किल्ल्यात दीपगृह बघायला गेलो. चार-सव्वाचार वाजले होते. दीपगृहाच्या इथं जरा गर्दी दिसली. तिथून समोरच नानी दमणचा बीच दिसला. हा बीच अधिक देखणा दिसत होता. तिथं वॉटरस्पोर्ट आणि इतर ॲक्टिव्हिटी पण सुरू असलेल्या दिसल्या. गर्दीही होती. मग तिथून उतरून थेट त्या बीचवरच गेलो. इथल्या बीचवर बारीक वाळू होती. तिथंच बसलो. समोर बरेच लोक वॉटर स्पोर्टचा आनंद लुटत होते. हा बीच जरा इतर बीचसारखा गजबजलेला वाटला. समोरच एक मीरा कॅफे नावाचं हॉटेल होतं. तिथं फार सुंदर चहा मिळाला. मग आम्ही संपूर्ण संध्याकाळ तिथंच रेंगाळलो. अंधार पडल्यावर मग पुन्हा कार काढून त्या संपूर्ण कोस्टल रोडनं आम्ही राहत होतो त्या जांपोर बीचपर्यंत चक्कर मारली.
आता त्या गावाचा आकार-उकार मला जरा समजायला लागला होता. पुन्हा सावकाश गाडी चालवत इकडे आलो. मीरा कॅफेमध्येच निवांत जेवलो. तिथं आमच्याशिवाय कोणीही नव्हतं. नंतर एक-दोन फॅमिली आल्या. एवढी असीम शांतता, समोर सुंदर झगमगता रस्ता, तिथं स्केट करणारे, चित्रं काढणारे लोक... काही क्षण एकदम परदेशात आल्यासारखंच वाटलं. एकदम लक्षात आलं, की आपल्याला हवंय ते हे! शांतता... मायेनं थोपटणाऱ्या आईच्या हातासारखी शांतता... जवळच्या माणसाच्या मिठीच्या ऊबेत मनाला लाभते ती असीम शांतता.... आमचं बोलणं, गप्पा, बडबड एकदम कमी कमी होत गेलं... आम्ही ती शांतता स्वत:त मुरवत स्वस्थ बसून राहिलो. त्या बीचवर रस्त्याच्या कडेने फूटपाथ आणि बसायला कठडे केले आहेत. किती तरी वेळ तिथं बसलो. मागून समुद्रावरून येणारं थंडगार वारं, समोर दीपगृहाचे फिरणारे दिवे आणि आकाशात पौर्णिमेचा पूर्ण चंद्र! अहाहा... ते सगळे क्षण मनाच्या कुपीत अत्तरासारखे घट्ट बंद करून ठेवले.
जेवण झाल्यावर सावकाश हॉटेलकडं निघालो... मन समाधानानं, आनंदानं भरून आलं होतं... दुसऱ्या दिवशी इथं आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं.... आता काही बघण्याची असोशी उरली नव्हती की कुठेही घाई-गर्दीत टिकमार्क करत जायचं नव्हतं... दमणनं जे काही द्यायला हवं होतं ते दिलं होतं... 



(पूर्वार्ध)

---

उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा...