3 Aug 2019

मराठी व्याकरण - भाग ७ ते १२

मराठी व्याकरण
---------------
भाग ७
---------

आज एकेका सुट्या शब्दांऐवजी नेहमी घोळ होणाऱ्या शब्दांचे, अचूक लिहिण्यासाठीचे साधे-सोपे नियम पाहू या. हे नियम लक्षात राहिले, की मग ते शब्द कधीच चुकणार नाहीत.

१. जाऊन, खाऊन, जेवून, ठेवून...
या शब्दांमध्ये मधले अक्षर ऊ लिहायचे, की वू लिहायचे याबाबत अनेकांचा गोंधळ होतो. त्यामुळे जावून, खावून, जेऊन, ठेऊन, देवून, घेवून अशी चुकीची रूपे लिहिलेली आढळतात.
कुठल्या शब्दात ‘ऊ’ लिहायचे आणि कुठल्या शब्दात 'वू’ याबाबत सोपा नियम असा, की त्या शब्दाचे मूळ क्रियापद पाहायचे. त्यात व असेल तरच वू लिहायचे. व नसेल तर ऊ लिहायचे. जाऊन या शब्दामध्ये मूळ क्रियापद जाणे असे आहे. त्यात व नाही. त्यामुळे हा शब्द ‘जाऊन’ असा लिहिला जाईल. ठेवून या शब्दात मूळ क्रियापद ठेवणे असे आहे. त्यात ‘व’ असल्याचे तो शब्द ‘ठेवून’ असा लिहिला जाईल. त्याचप्रमाणे जेवणे - जेवून, खाणे - खाऊन, जाणे - जाऊन, घेणे - घेऊन असे शब्द योग्य पद्धतीने लिहावेत.
२. खानावळ नव्हे; खाणावळ
जसे जेवण - जेवणावळ तसेच खाणे - खाणावळ. त्यामुळे हा शब्द ‘खानाव‌‌ळ’ असा लिहिणे अयोग्य. चित्रपटसृष्टीतील खान मंडळींच्या चलतीला उद्देशून कुणी तरी गमतीने ‘खानावळ’ शब्द वापरला तर तो योग्य; अन्यथा जेवण्याच्या ठिकाणासाठी ‘खाणावळ’ असेच लिहायला हवे. तोच प्रकार 'काणाडोळा' या शब्दाचा. हा शब्द 'कानाडोळा' असा चुकीचा लिहिला जातो. एखाद्या गोष्टीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणे म्हणजे तिकडे डोळा 'काणा' (तिरका) करणे. इथे 'काना'चा काहीही संबंध नाही. मात्र, कुणी हा शब्द 'कानाडोळा' असा लिहिल्यास तिकडे 'काणाडोळा' करू नये. ती चूक संबंधितांच्या लक्षात आणून द्यावी.
३. ‘द’ कुठे आणि ‘दी’ कुठे?
आपण अनेकदा इंग्रजी शब्द देवनागरी लिपीतून लिहितो. उदा. अनेक संस्थांची नावे इंग्लिशमध्ये असतात. ती देवनागरीतून लिहिताना ‘The’ हा शब्द कधी ‘द’, तर कधी ‘दी’ असा लिहिला जातो. याबाबत सोपा नियम असा, की इंग्लिशमध्ये जो शब्द किंवा शब्दसमूह स्वरांनी (A, E, I, O, U) सुरू होतात, त्या शब्दांआधी येणारा ‘The’ ‘दी’ असा लिहावा, तर जे शब्द किंवा शब्दसमूह व्यंजनांनी सुरू होतात, त्या शब्दांआधी येणारा ‘The’ हा ‘द’ असा लिहावा. ‘द सन’ आणि ‘दी अर्थ’ हे याचे लक्षात ठेवायला सोपे उदाहरण आहे. ‘द पूना मर्चंट्स चेंबर’ आणि ‘दी असोसिएशन ऑफ इंजिनीअर्स’ असे लिहिणे योग्य.
४. इंग्रजी अक्षरे दीर्घच
इंग्रजीमधील सर्व वर्णमाला देवनागरीतून लिहिताना सर्व अक्षरे दीर्घ लिहावीत. म्हणजे बी, सी, डी, ई, यू अशीच लिहावीत. बि, सि, डि, इ, यु अशी लिहू नयेत. जेव्हा ही अक्षरे जशी आहेत तशी म्हणूनच लिहायची असतात तेव्हासाठीच हा नियम आहे. उदा. लघुरूप असेल तेव्हा. U B Kulkarni हे यू. बी. कुलकर्णी असेच लिहावे. मात्र, कधी कधी मराठी लघुरूप असेल तर ते मूळ शब्दाप्रमाणेच लिहावे. उदा. यु. म. पठाण. यांचे नाव मराठीत लिहिताना ‘युसूफ’ असल्याने ‘यु.’ असेच लिहिले जाईल. तेच हे नाव इंग्रजीत U M Pathan असे होत असल्याने ते इंग्रजी अक्षराच्या नियमाप्रमाणे यू. एम. पठाण असेच लिहावे. त्याचप्रमाणे ही अक्षरे इंग्रजी नावांत येतात तेव्हाही त्यांचे लिखाण वेगळे होईल. उदा. United हा शब्द लिहिताना ‘युनायटेड’ (यु ऱ्हस्व) लिहिला जाईल. तिथे ‘इंग्रजी अक्षरे कायम दीर्घ’ हा नियम लागू होणार नाही.
५. कायम पहिली वेलांटी
इंग्रजीत ing प्रत्यय लागलेला प्रत्येक शब्द मराठीत लिहिताना पहिली वेलांटी देऊनच लिहावा. उदा. coming - कमिंग, going - गोइंग, Building - बिल्डिंग, Marking - मार्किंग इ.
---
----
भाग ८
--------

१. द्ध आणि ध्द, द्व आणि व्द
प्रसिद्ध, श्रद्धा, बुद्धी अशा शब्दांमध्ये येणारे ‘द्ध’ हे जोडाक्षर ‘ध्द’ असे लिहिणे अयोग्य. मराठीत आपल्या उच्चारणाचा आणि लेखनाचा क्रम सारखाच असतो. हे जोडाक्षर जेव्हा ‘द्ध’ असे लिहिले जाते, तेव्हा त्याची फोड ‘द् + ध’ अशी असते. हे अक्षर उच्चारतानाही आपण आधी ‘द्’ आणि मग ‘ध’ अशाच योग्य क्रमाने उच्चारतो. त्यामुळे त्याचे लेखन कायम ‘द्ध’ असेच करावे. ‘ध्द’ हा उच्चार मराठीत बहुतेक कुठेच वापरला जात नाही, हे आपल्या लक्षात येईल. तीच गोष्ट द्वार, द्वादशी या शब्दांची. यातही आधी ‘द्’ आणि मग ‘व’ ही अक्षरे येतात, हे उच्चार केल्यास लक्षात येते. त्यामुळे हे शब्दही ‘व्दार’, ‘व्दादशी’ असे न लिहिता द्वार, द्वादशी असेच लिहावेत. ‘व्द’ हे अक्षरही मराठीत फारसे उच्चारले जातच नाही.
२. किंमत-किमतीला, रक्कम-रकमेला
किंमत या शब्दाचे सामान्यरूप होताना ‘कि’वरचा अनुस्वार जातो आणि तो शब्द ‘किमतीला’ असा लिहिला जातो. ‘किंमतीला’ असे लिहिणे अयोग्य. ‘हिंमत’चेही याचप्रमाणे ‘हिमतीला’ असे सामान्यरूप होईल. अन्य उदाहरण : गंमत - गमतीने.
‘रक्कम’ या शब्दाचे सामान्यरूप होताना ‘क’चे द्वित्व जाते आणि तो शब्द ‘रकमेला’ असा लिहिला जातो. बाकी उदाहरणे : अक्कल - अकलेची, मुद्दल - मुदलात, जिन्नस - जिनसांची, शिल्लक - शिलकेची, डुक्कर - डुकरांची, थप्पड - थपडेची, टक्कर - टकरेची, चप्पल - चपलेची, नक्कल - नकलेची, पक्कड - पकडेची, बक्कल - बकलाची, छप्पर - छपरावर इ.
३. पाऊस-पावसात, देऊळ-देवळात...
पाऊस, देऊळ अशा शब्दांचे सामान्यरूप होताना ती ‘पावसात’, ‘देवळात’ अशी होतात. थोडक्यात ‘ऊ’ची जागा ‘व’ हे अक्षर घेते. ‘पाऊसात’, ‘देऊळात’ असे लिहिणे चूक. ‘पाऊल’चे सामान्यरूपही ‘पावलात’ असेच होते. अराकान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूपे होताना, खाटीक - खाटकाचा, कापूस - कापसाला, चाबूक - चाबकाची, ढेकूण - ढेकणाची, तांदूळ - तांदळाची, बेडूक - बेडकाची, माणूस - माणसाची अशी रूपे होतात.
अकारान्त स्त्रीलिंगी नामांची सामान्यरूपे पुढीलप्रमाणे : खारीक : खारकेची, तारीख - तारखेची, बाभूळ - बाभळीची, बेरीज - बेरजेची.
४. आरसा - आरशाने, ससा - सशाने
आकारान्ती शब्दांचे सामान्यरूप होताना ‘सा’चा ‘शा’ होतो. उदा. आरसा - आरशाने, ससा - सशाने, पैसा - पैशाने, घसा - घशाने, मासा - माशाने.
(मासा आणि माशी यांचे अनेकवचन किंवा सामान्यरूप होताना वेगवेगळे होते, याचे कारण मुळात हे दोन वेगळे शब्द आहेत. ‘मासा’चे माशाने असे होते, तर ‘माशी’ या शब्दात मुळातच ‘श’ असल्याने त्याचे सामान्यरूप ‘माश्यांनी’ असे होते. ‘जाळ्यात पकडल्यावर माशांची तडफड सुरू होती’ आणि ‘हलवायाच्या दुकानात माश्या घोंघावत होत्या’ ही वाक्यरचना बरोबर. या दोन शब्दांत नेहमी गोंधळ होतो. त्यामुळे मूळ शब्द लक्षात ठेवावा.)
५. राजकीय पक्ष व उडणारे पक्षी
राजकीय पक्ष असतात त्यांच्याबाबत जेव्हा उल्लेख असेल, तेव्हा ‘पक्षांनी’ असेच सामान्यरूप होईल. मात्र, आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांबाबत उल्लेख असेल, तेव्हा ‘क्ष’ला ‘य’ जोडून ‘पक्ष्यांनी’ असेच सामान्यरूप होईल. या दोन्हींमध्ये अनेकदा गल्लत होते. ‘राजकीय पक्ष्यांनी’ असे लिहिणे चूक, तसेच ‘पक्षांचा थवा उडत होता’ असे लिहिणेही चूकच.
---
---

भाग ९
--------

१. रफार कुठे द्यायचा?
आपल्याकडे एखाद्या शब्दात रफार नेमका कुठे द्यायचा, याबाबत अनेकांचा गोंधळ असल्याचे जाणवते. त्यामुळेच ‘पुनर्रचना’ हा शब्द ‘पुर्नरचना’ असा चुकीचा लिहिलेला आढळतो. मराठीत आपण जसे अक्षरांचे उच्चार करतो, तसेच म्हणजे त्याच क्रमाने लिहितो. पुनर्रचना हा शब्द उच्चारताना आपण पु-न-र-र-च-ना असा उच्चारतो.
पाय मोडलेला म्हणजेच ज्यात स्वर मिसळलेला नाही अशा र् च्या नंतर व्यंजन आल्याने त्याचा रफार होतो. त्यामुळे रफार कुठे द्यावा, याची शंका असल्यास तो शब्द सावकाश उच्चारून पाहावा. ‘र’चा उच्चार जेथे संपतो, त्यानंतर येणाऱ्या अक्षरावर रफार द्यावा. अन्य उदाहरणे : पुनर्जन्म, पुनर्स्थापना, पुनर्विचार, पुनर्विवाह, पुनर्भेट, इ.
(येथे मुळात पुन: + पुढील व्यंजन अशी रचना आहे. संधी होताना विसर्ग जाऊन त्या जागी ‘र’ येतो. या ‘र’साठी पुढील रफार येतो, हे लक्षात असू द्यावे. काही काही शब्द ‘पुन:’ हा उपसर्ग जसा आहे तसाच ठेवून लिहिले जातात. उदा. पुन:प्रत्यय. हा शब्द पुनर्प्रत्यय असा लिहिला जात नाही. तसा लिहिला तरी तो चूक मात्र नाही. मात्र, रूढ नाही.)
२. आणखी रफार...
संधी नसलेल्या अनेक तत्सम शब्दांत आपण रफार देतोच. उदा. समर्पण, अर्पण, दर्पण इ. हे शब्द इथे दिले आहेत तसेच लिहिणे योग्य. (मराठीतील सरपण हा शब्द मात्र ‘सर्पण’ असा लिहू नये. कारण त्यातील र स्वरासहित आहे )
३. गावाच्या नावात ‘पूर’ असेल तर...
हा नियम मराठी साहित्य महामंडळाच्या नियमावलीत आहे. एखाद्या गावाच्या नावात ‘पूर’ असेल तर ‘पू’ला दुसरा उकार द्यावा. उदा. कोल्हापूर, सोलापूर, श्रीरामपूर. मात्र, ‘कोल्हापुरात’ लिहिताना ‘पु’ला पहिला उकार द्यावा. कोल्हापूर - कोल्हापूरला - कोल्हापूरमध्ये - कोल्हापुरात हे योग्य. ‘कोल्हापूरात’, ‘सोलापूरात’ असे लिहिणे चुकीचे, हे लक्षात ठेवावे.
४. देशातील काही प्रमुख शहरांची नावे
तिरुअनंतपुरम - केरळची राजधानी. या शहराचे इंग्रजांच्या काळात रूढ झालेले ‘त्रिवेंद्रम’ हे नाव बदलून ‘तिरुअनंतपुरम’ करण्यात आले आहे. ते अनेक लोक थिरुअनंतपूरम, थिरूअनंतपूरम, तिरुवअनंतपुरम अशा वेगवेगळ्या पद्धतीने चुकीचं लिहितात. दाक्षिणात्य भाषांत ‘तिरु’ याचा अर्थ ‘श्री’. तिरुपती याचा अर्थ श्रीपती. श्रीअनंतपूर अशा अर्थाचे हे गावाचे नाव. दक्षिणेत तिरुअनंतपुरम असे लिहिले जाते. शेवटी ‘पूर’चे संस्कृत ‘पुरम’ झाल्यामुळे ‘पु’ला पहिला उकार येतो, हे लक्षात ठेवावे.
चंडीगड - उत्तरेकडे हिंदीत ‘गड’ हा शब्द ‘गढ’ असा लिहिला जातो. त्यामुळे तेथे ज्या ज्या शहरांच्या शेवटी ‘गढ’ आहे ते सर्व शब्द मराठीत ‘गड’ असे लिहिण्याचा वृत्तपत्रीय संकेत आहे. त्यामुळे चंडीगड असे लिहिणे योग्य. त्याचप्रमाणे अलिगड, चित्तोडगड, राजगड अशी नावे लिहिणे योग्य.
लखनौ - हे नाव हिंदीत ‘लखनऊ’ असे लिहिले जात असले, तरी मराठीत ते ‘लखनौ’ असे लिहिण्याचा प्रघात आहे.
आग्रा - हे नाव हिंदीत ‘आगरा’ असे लिहिले जात असले, तरी मराठीत ते ‘आग्रा’ असेच लिहिण्याचा प्रघात आहे.
(जाता जाता... चेन्नई, कोलकाता व मुंबई या शहरांची नावे आता बदलली असली, तरी तेथील उच्च न्यायालयांची नावे अद्याप बदललेली नाहीत. त्यामुळे मद्रास उच्च न्यायालय, कलकत्ता उच्च न्यायालय असेच लिहावे. मात्र, मुंबईपुरता मराठी वृत्तपत्रांनी अपवाद केला आहे. आपण मराठीत बॉम्बे उच्च न्यायालय न म्हणता, मुंबई उच्च न्यायालयच म्हणतो.)
५. महाराष्ट्रातील गावे....
पूर - पुरात हा उल्लेख वर आलाच आहे. पूर्वी ज्या गावांच्या नावात ‘गाव’ आहे ते लिहिताना ‘गांव’ असं ‘गा’वर अनुस्वार देऊन लिहिण्याची पद्धत होती. मात्र, महामंडळाने बदललेल्या नियमांनुसार आता हा अनुच्चारित अनुस्वार काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे ‘जळगांव’, ‘चाळीसगांव’, ‘कोपरगांव’, ‘तळेगांव’ असे न लिहिता ‘जळगाव’, ‘चाळीसगाव’, ‘कोपरगाव’, ‘तळेगाव’ असेच लिहावे. पूर्वी छोट्या गावांमध्ये खुर्द व बुद्रुक असत. एकाच नावाच्या दोन गावांमधले मोठे गाव म्हणजे बुद्रुक, तर (शक्यतो नदीपलीकडले) छोटे गाव म्हणजे खुर्द. अजूनही अनेक गावांसमोर खुर्द व बुद्रुक लिहिलेले असते. पूर्वी ‘खु।।‘ अशा पद्धतीने दोन दंड देऊन लिहिण्याची पद्धत होती. आता शक्यतो पूर्ण खुर्द व बुद्रुक लिहावे, असा संकेत आहे.
---
---

भाग १०
----------

१. ‘ऋ’ या स्वराबद्दल...
व्यंजनात हा स्वर मिसळून झालेले व्यंजनाचे रूप आपण अनेक शब्दांत वापरत असतो.
उदा. क् + ऋ = कृ (कृपा, कृती इ.)
ग् + ऋ = गृ (गृह, जागृती इ.)
स्वर मिसळून तयार झालेली अक्षरे -
क् + ऋ = कृपा
त् +ऋ = तृप्ती
स् + ऋ = सृष्टी
ब् + ऋ = बृहस्पती
व्यंजन जोडून तयार झालेली अक्षरे -
क् + रू = क्रूर
त् + रू = त्रुटी
श् + रू = अश्रू
‘ऋ’ आणि ‘ऊ’ या स्वरांच्या उच्चारांमध्ये फरक आहे. ‘उ/ऊ’चा उच्चार स्वच्छ, खणखणीत होतो. ‘ऋ’चा उच्चार मात्र ‘उ’ आणि ‘इ’ यांच्या मध्ये कुठे तरी असतो. किंबहुना तो ‘इ’च्या दिशेलाच अधिक झुकलेला असतो. बोलीभाषांमध्ये त्याचे जे रूप होते, त्यावरून हे स्पष्ट होते. तिथे ‘शृंग’चे ‘शिंग’ असे होते; ‘शुंग’ होत नाही. ‘शृंगार’चे ‘शिणगार’ किंवा ‘शिंगार’ होते; ‘शुणगार’ होत नाही. ‘कृपा’चे किरपा होते; ‘कुरपा’ होत नाही.

२. ऐ आणि औ : मराठी उच्चार आणि हिंदी उच्चार
‘ऐ’ या स्वराच्या उच्चाराची फोड अ + इ अशी होते.
उदा. ‘बैल’ हा शब्द मराठीत आपण ब + इ + ल असा उच्चारतो.
‘औ’ या स्वराच्या उच्चाराची फोड अ + उ अशी होते.
उदा. ‘गौरी’ हा शब्द आपण मराठीत ग + उ + री असा उच्चारतो.
त्यामुळे हिंदीप्रमाणे बॅल, गॉरी असे उच्चार करू नयेत. लेखन योग्य केले आणि त्या शब्दांची फोड नीट लक्षात घेतली, की उच्चारही चुकत नाहीत, हे लक्षात ठेवावे.

३. माझी मदत कर... मी तुझे धन्यवाद करतो
मराठीवर हिंदीचा प्रभाव वाढत चालल्याचे मालिकांमधील संवादांमधून स्पष्टपणे लक्षात येते. ‘तू माझी मदत करशील का?’ असे वाक्य अनेकदा कानावर येते. मराठी व्याकरणाच्या दृष्टीने हे वाक्य सपशेल चुकीचे आहे. मराठीत ‘तू मला मदत कर’ असे म्हणतात. ‘माझी मदत कर’ हे ‘मेरी मदद करो’ या हिंदी वाक्याचे सरळसरळ रूपांतर आहे. हिंदी वाक्य बरोबर असले, तरी त्याचे हे शब्दश: भाषांतर मात्र बरोबर नाही. तिथे ‘तू मला मदत कर’ असेच म्हणायला हवे. त्याचप्रमाणे ‘तू माझी मदत केल्याबद्दल तुझे धन्यवाद’ हेही चूकच. ‘मला मदत केल्याबद्दल तुला धन्यवाद’ असे ते वाक्य हवे. खरं तर नुसते ‘धन्यवाद’ही पुरेसे आहेत.
याबरोबरच ‘कार्यक्रम संपन्न झाला’ अशी वाक्यरचना अनेकदा आढळते. मराठीत ‘संपन्न’ याचा अर्थ ‘समृद्ध’ असा होतो. त्यामुळे ‘कार्यक्रम झाला’ किंवा पार पडला एवढेचे पुरेसे आहे.

४. हिंदी/इंग्रजी शब्दांना पर्याय
इतर भाषांमधून आलेले शब्द घेत घेतच कुठलीही भाषा वाढत असते. म्हणूनच भाषेला नेहमी नदीच्या प्रवाहाची उपमा देतात. असे असले, तरी आपल्या भाषेत योग्य शब्द असतानाही केवळ ते माहिती नाहीत, म्हणून इतर भाषांमधले शब्द उसने घेऊन वापरणे हे म्हणजे आपले घर धनधान्याने भरलेले असतानाही शेजारच्यांकडे जाऊन जेवण्यासारखे आहे.
हिंदी किंवा इंग्रजी शब्दांना पर्याय म्हणून नेहमी वापरता येण्यासारखे मराठी शब्द -
मौका - संधी, आयाम/ डायमेन्शन - मिती, टेन्शन - तणाव, मौसम - हवामान, हमेशा - नेहमी, बोअर - कंटाळा, समारोह - सोहळा किंवा समारंभ, विमोचन - प्रकाशन इ.

५. नेहमी चुकणारे आणखी काही शब्द
शीला व कोनशिला - पहिला शब्द शीला हे एक विशेषनाम आहे व ते शील या संस्कृत शब्दापासून तयार झाले आहे.
‘कोनशिला बसविली’ असे आपण नेहमी बातम्यांमध्ये वाचतो. यात ‘शिला’ हा वेगळा संस्कृत शब्द असून, त्याचा अर्थ शिळा (मोठा दगड) असा होतो. त्यामुळे ‘कोनशिला’ या शब्दात ‘श’ला पहिली वेलांटी देणे योग्य, हे लक्षात ठेवावे.
शीर व शिर -
पहिला शब्द ‘शीर’ याचा अर्थ नस किंवा शरीरातील रक्तवाहिनी. ‘त्याला शिरेतून इंजेक्शन दिले’ असे वाक्य आपण वाचले असेल. यातल्या ‘श’ला कायम दुसरी वेलांटी असते.
‘शिर’ या शब्दाचा अर्थ मस्तक, डोके असा होतो. ‘खून झालेल्या व्यक्तीचे शिर जागेवर नव्हते’ असा उल्लेख बातम्यांत आपण वाचतो. तेथे ‘शिर’ असाच शब्द लिहिणे अपेक्षित आहे. यात ‘श’ला कायम पहिली वेलांटी असते हे लक्षात ठेवावे.
‘ईश’ प्रत्यय लागून तयार होणारी विशेषनामे
उदा. गिरीश, रमेश, हरीश, सुरेश इ.
यात शेवटचे अक्षर कायम शहामृगामधला ‘श’ असते, हे लक्षात ठेवावे. गिरीश हे शंकराचे नाव. गिरी + ईश = गिरीश. रमेश हे विष्णूचे नाव. रमा + ईश = रमेश. यात ‘ईश’ हा शब्द असल्याने व त्यात ‘श’ शहामृगाचा असल्याने या सर्व शब्दांच्या शेवटी ‘श’ येते; ‘ष’ नव्हे, हे लक्षात ठेवावे.
विशेष नोंद - शिरीष या शब्दात शेवटी षटकोनातील ‘ष’ येतो. याचे कारण तो शब्द ‘ईश’ प्रत्यय लागून तयार झालेला शब्द नसून, स्वतंत्र शब्द आहे. शिरीष हे एका वृक्षाचे नाव आहे. ते स्त्री व पुरुष अशा दोघांनाही ठेवले जाते.
उदा. शिरीष पै (आचार्य अत्रे यांच्या कन्या) व शिरीष कणेकर (प्रसिद्ध लेखक).
सुहास, किरण ही अशीच आणखी काही उदाहरणे.
---
---

भाग ११
----------

विरामचिन्हे

मराठीत किंवा कुठल्याही भाषेत वाक्यांमधील विविध भाव, अर्थ, ठेहराव आदी दर्शविण्यासाठी विरामचिन्हे वापरतात. विरामचिन्हांना व्याकरणकर्त्यांनी भाषेचे दागिने म्हटलं आहे. अंगावर दागिने नसलेल्या स्त्रीपेक्षा सालंकृत स्त्री सुंदर दिसते. त्याचप्रमाणे योग्य त्या विरामचिन्हांचा वापर करून लिहिलेला मजकूर केवळ नीटनेटका दिसतो, असं नाही, तर तो वाचकाला त्या मजकुराचा अर्थ समजण्यासाठी मदत करतो.
विरामचिन्हे नसलेले वाक्य पाहा -
आवडले का तुला हे पुस्तक हो जेवल्यावर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे नील म्हणाला वडील म्हणाले रामायण कुणी लिहिले आहे का तुला ठाऊक
विरामचिन्हे असलेले वाक्य पाहा -
“आवडले का तुला हे पुस्तक?“
“हो! जेवल्यावर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे,” नील म्हणाला.
वडील म्हणाले, “रामायण कुणी लिहिले, आहे का तुला ठाऊक?”
वरील दोन्ही वाक्ये वाचल्यानंतर विरामचिन्हांचे महत्त्व आपल्या लक्षात येईल.
मराठीत आपण एकूण नऊ विरामचिन्हे वापरतो.
१. पूर्णविराम (.) - अ) विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी पूर्णविराम वापरतात. उदाहरण - तो घरी गेला.
आ) शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी. उदाहरण - य. गो. जोशी
२. अर्धविराम { ; } - दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडायची असतील, तेव्हा हे चिन्ह वापरतात. हल्ली या चिन्हाचा वापर फार कमी होताना दिसतो. मात्र, वाक्यांतून नेमका अर्थ पोचविण्यासाठी हे चिन्ह जरूर वापरावे.
उदाहरण - ढग खूप गर्जत होते; पण पाऊस पडला नाही.
३. स्वल्पविराम (,) - अ) एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. उदाहरण - हुशार, अभ्यासू, खेळकर व आनंदी मुले सर्वांना आवडतात.
आ) संबोधन दर्शविताना स्वल्पविराम वापरतात. उदाहरण - नील, इकडे ये.
स्वल्पविराम चुकीच्या ठिकाणी देण्याने भलते गोंधळ होऊ शकतात. याबाबतचे विनोदही प्रसिद्ध आहेत. जिज्ञासूंनी ’गुगल’ करून पाहावेत.
४. अपूर्ण विराम किंवा उपपूर्णविराम { : } - वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास हे चिन्ह वापरतात. उदाहरण - पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले : १, ८, १४, २७, ४०.
{ : } हे चिन्ह विसर्गाचेही चिन्ह आहे. दोन्ही चिन्हे एकच आहेत. मात्र, अपूर्ण विराम म्हणून या चिन्हाचा वापर केवळ वरील उदाहरणात दिली तशी माहिती द्यायची असेल, तरच करावा.
५. प्रश्नचिन्ह (?) - प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. उदाहरण - तू केव्हा आलास?
महत्त्वाचे म्हणजे हे प्रश्नचिन्ह अक्षराला जोडूनच देतात. मध्ये स्पेस देऊन पुढे प्रश्नचिन्ह देऊ नये.
बातमी लिहिताना अनेकदा ‘मग पाच वर्षांचा हिशेब तुम्ही केव्हा देणार? असा सवाल करून...’ अशी वाक्यरचना दिसते. ती चुकीची आहे. पुढे ‘असा सवाल करून’ असे म्हटले असेल, तर त्याआधी प्रश्नचिन्ह न येता, स्वल्पविराम द्यायला हवा. त्यामुळे हे वाक्य ‘मग पाच वर्षांचा हिशेब तुम्ही केव्हा देणार, असा सवाल करून...’ असे लिहिणे योग्य. कधी कधी वाक्यात एकापाठोपाठ एक प्रश्न असतात. त्यात शेवटी पुन्हा ‘असे प्रश्न उपस्थित करून...’ असे लिहिले असेल, तरीही त्या प्रत्येक प्रश्नासमोर प्रश्नचिन्ह न येता, स्वल्पविरामच देणे योग्य. मात्र, शेवटी ‘असा सवाल करून’ किंवा ‘असे प्रश्न उपस्थित करून’ अशा शब्दांत वर्णन नसेल व वाक्य प्रश्नार्थक संपत असेल, तर तिथे प्रश्नचिन्ह द्यायला हवे.
उदाहरण - ‘शहरात सगळीकडे खड्डे पडले आहेत,’ अशी टीका करून ते म्हणाले, ‘यावर दाद मागण्यासाठी नागरिकांनी जायचे कुठे?’
इथे ‘कुठे’च्या समोर प्रश्नचिन्ह देणे योग्य होय.
बातमीव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारच्या लेखनालाही हेच नियम लागू होतात.
६. उद्गारचिन्ह (!) - उत्कट भावना दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गारचिन्ह देण्याची पद्धत आहे. उदाहरण -
अ) अरेरे! तो नापास झाला. आ) शाब्बास! छान खेळलास. इ) वाहव्वा‌! काय तान घेतलीय!
हल्ली उठसूठ उद्गारचिन्ह टाकून मजकूर लिहिण्याची सवय अनेकांना असते. आपले वैयक्तिक लेखन करताना किती उत्कटपणा दाखवावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न असला, तरी बातमी किंवा अन्य माहितीपर प्रमाणलेखन करताना नियमानुसारच हे चिन्ह वापरावे. हा ‘दागिना’ मोजक्याच ठिकाणी खुलून दिसतो, हे लक्षात ठेवावे. प्रश्नचिन्हाप्रमाणेच उद्गारचिन्हही अक्षराला जोडूनच लिहावे. मध्ये स्पेस देऊन लिहू नये.
७. अवतरणचिन्हे (“ ”) - अ) दुहेरी अवतरणचिन्ह - बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी त्या वाक्याच्या दोन्ही बाजूस दुहेरी अवतरण देतात. उदाहरण - तो म्हणाला, “मी गाण्याच्या कार्यक्रमाला येईन.”
महत्त्वाचे - एखादे वाक्य अपूर्ण असेल, तर आधी स्वल्पविराम येतो व मग दुहेरी अवतरणचिन्ह येते, हे लक्षात ठेवावे.
उदाहरण - “देव वरून पाहतोय,” असे म्हणून संदेश त्राग्याने म्हणाला, “सगळ्याचा हिशेब देवाकडे द्यावा लागेल.”
आ) एकेरी अवतरणचिन्ह - एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असता किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना एकेरी अवतरण वापरतात. एखाद्या शब्दातून वेगळा अर्थ ध्वनित करायचा असेल, तरीही एकेरी अवतरणचिन्ह वापरतात.
उदाहरण - अ) पुणे ही महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’ आहे. आ) ‘भारतीयांची परदेशांतील वागणूक लज्जास्पद असते,’ असे मत मध्यंतरी टीव्हीवरील चर्चेत ऐकायला मिळाले होते. इ) संध्याकाळी वाहतूक कोंडीच्या वेळी दुचाकीचालकांची ‘सर्कस’ चालू असते.
८. संयोगचिन्ह (-) - अ) दोन शब्द जोडताना हे चिन्ह वापरतात. उदाहरण - विद्यार्थि-मंडळ, वधू-वर, आदान-प्रदान इ.
आ) ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास हे चिन्ह देतात. उदाहरण - आजचा कार्यक्रम शाळे-
पुढील पटांगणावर होईल.
(विशेष नोंद - पूर्वी खिळेजुळणीच्या काळी हे चिन्ह देण्याची गरज भासत असे. आता संगणकावर टंकलेखन होत असल्याने या चिन्हाची आवश्यकता पडत नाही. इथे केवळ माहितीस्तव उदाहरण दिले आहे.)
९. अपसारणचिन्ह (-) (डॅश) (स्पष्टीकरण चिन्ह) - अ) बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास हे चिन्ह वापरतात. उदाहरण - मी तेथे गेलो, पण -
आ) वाक्यादरम्यान स्पष्टीकरण द्यायचे असल्यास हे चिन्ह वापरतात. उदाहरण - तो मुलगा - ज्याने बक्षीस मिळविले - आपल्या शाळेत आहे.
---
(माहितीस्रोत : मो. रा. वाळंबे लिखित ‘सुगम मराठी व्याकरण लेखन’, नितीन प्रकाशन, पुणे)
---

भाग १२
----------

१. अनुस्वार
अ) ज्या अक्षराचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो, त्या अक्षरावर अनुस्वार द्यावा.
थोडक्यात, स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.
उदाहरणार्थ : आंबा, तंतू, घंटा, हिंग, सुंठ, गंमत, करंजी, गुलकंद, गंगा, कुंकू, तंटा, चिंच, उंट, निबंध, अलंकार
आ) संस्कृतमध्ये मराठीत जसेच्या तसे आलेल्या (तत्सम) शब्दांतील अनुस्वार पर-सवर्णाने (म्हणजे पुढे येणाऱ्या व्यंजनाच्या वर्गातील पंचमवर्णाने *) लिहायला हरकत नाही.
उदाहरणार्थ : कुंज - कुञ्ज, घंटा - घण्टा, अंत - अन्त, चंपक - चम्पक, शंख - शंङ्ख, पंचम - पञ्चम, चंड - चण्ड, छंद - छन्द, अंबुज - अम्बुज
(* पंचमवर्ण -
क ख ग घ ङ
च छ ज झ ञ
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
वरील पाच गटांत ‘क ख ग घ’ या व्यंजन गटासाठी ङ हा पंचमवर्ण आहे व याप्रमाणे अन्य)
इ) य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल संस्कृतातल्याप्रमाणे केवळ शीर्षबिंदू द्यावा.
उदाहरणार्थ -
संयम, संरक्षण, संलग्न, संवाद, संशय, संसार, सिंंह, अंश, संस्कार, मांस, संस्था, संहार, संयुक्त, कंस इ.
ई) नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.
एकवचन - मुलास, घरात, त्याचा, देशासाठी
अनेकवचन - मुलांस, घरांत, त्यांचा, देशांसाठी
उ) वरील नियमांव्यक्तिरिक्त आता कुठेही अनुस्वार देऊ नयेत. अनुच्चारित अनुस्वार पूर्वीच्या प्रमाणात देत असत, हे आता देऊ नयेत.
उदा. पहांट, केंस, झोंप, लांकूड, नांव, पांच, कांटा, सांवळा, केंळे, तिनें, घरांत, जेथें, तेव्हां असे लिहू नये. त्याऐवजी पहाट, केस, झोप, लाकूड, नाव, पाच, काटा, सावळा, केळे, तिने, घरात, जेथे, तेव्हा असे लिहिणे योग्य.

२) इतर नियम
अ) एकारान्त नामाचे सामान्यरूप याकारान्त करावे.
उदा. करणे - करण्यासाठी, पाहणे - पाहण्यास, भावे - भाव्यांचा, फडके - फडक्यांना
(करणेसाठी, पाहणेस, भावेंचा, फडकेंना अशी रूपे लिहू नयेत.)
बातमी लिहिताना काही गावांबाबत असे चुकीचे लेखन केले जाते. अकोले, शिवणे, बांबवडे, नेवासे अशी एकारान्त गावे चुकीच्या सामान्यरूपाला बळी पडली आहेत. त्यामुळे अनेकदा ‘अकोलेत जोरदार पाऊस’, ‘शिवणेत उद्या मोर्चा’, ‘बांबवडेत रस्ता खचला’, ‘नेवासेत दर्शनाला गर्दी’ अशी शीर्षके पाहायला मिळतात. ती चूक आहेत. आपण ‘पुणेत जोरदार पाऊस’, ‘ठाणेत वाहतूक कोंडी’ असं लिहितो का? नाही ना! ‘पुण्यात जोरदार पाऊस’, ‘ठाण्यात वाहतूक कोंडी’ असेच लिहितो ना! मग तोच न्याय अकोले, शिवणे, बांबवडे, नेवासे या गावांनाही लावावा. ‘अकोल्यात जोरदार पाऊस’, ‘शिवण्यात उद्या मोर्चा’, ‘बांबवड्यात रस्ता खचला’, ‘नेवाशात दर्शनाला गर्दी’ अशा पद्धतीनेच ही शीर्षके दिली पाहिजेत.
आ) एखादा, कोणता अशी रूपे वापरावीत. एकादा, कोणचा असे लिहू नये.
इ) राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे लिहावीत. रहाणे-राहाणे, पहाणे-पाहाणे, वहाणे-वाहाणे अशी रूपे लिहू नयेत.
मात्र, आज्ञार्थी रूपे लिहिताना ‘राहा, पाहा, वाहा’ यांबरोबरच ‘रहा, पहा, वहा’ ही रूपे लिहिण्यास हरकत नाही.
ई) ‘ही’ हे शब्दयोगी अव्यय दीर्घान्त लिहावे. ‘आणि’ हे शब्दयोगी अव्यय ऱ्हस्वान्त लिहावे.

३) नेहमी चुकणारे आणखी काही शब्द
आधी चुकीचे लेखन व समोर अचूक लेखन या क्रमाने वाचावे.
मंदीर - मंदिर,
रविंद्र - रवींद्र,
सुशिला सुशीला,
नाविन्य - नावीन्य,
प्राविण्य - प्रावीण्य,
प्रतिक्षा - प्रतीक्षा,
उहापोह - ऊहापोह,
उर्मी - ऊर्मी,
अंध:कार - अंधकार,
घन:श्याम - घनश्याम,
धि:कार - धिक्कार,
निस्पृह - नि:स्पृह,
पृथ:करण - पृथक्करण,
मातोश्री - मातु:श्री,
मनस्थिती - मन:स्थिती,
हाहा:कार - हाहाकार,
विषद - विशद,
सुश्रुषा - शुश्रूषा,
विशिष्ठ - विशिष्ट,
अलिकडे - अलीकडे,
औद्योगीकरण - उद्योगीकरण,
अश्या - अशा,
सहाय्यक - सहायक,
आधीन - अधीन,
ईयत्ता - इयत्ता,
ऊग्र - उग्र,
दुर्वा - दूर्वा

४) हिंदीच्या प्रभावाने वापरले जाणारे शब्द
‘व्यस्त’ हा हिंदी शब्द आपल्याकडे एखादा माणूस बिझी आहे, अशा अर्थानं वापरला जातो. ते चूक आहे. त्यासाठी ‘व्यग्र’ असा शब्द आहे. ‘मी कामात व्यस्त आहे,’ असे लिहिण्याऐवजी ‘मी कामात व्यग्र आहे,’ असेच लिहावे. ‘व्यस्त’ या शब्दाचा मराठीतील अर्थ आहे उलट प्रमाण. व्यस्त गुणोत्तर असा शब्दप्रयोग तुम्ही ऐकला असेल.
---
---

1 Aug 2019

मटा लेख - १ ऑगस्ट १९

धोक्याची घंटा
-----------------

आपण छान मूडमध्ये नाटक बघायला आलेले असतो. बाकी सर्व चिंता, विवंचना बाजूला ठेवून आता दोन-अडीच तास समोर घडणाऱ्या नाट्यात हरवून जायचं अशी खूणगाठ आपण मनाशी बांधलेली असते. पहिली घंटा होते, मग आपण जरा सावरून बसतो. दुसरी घंटा होते. आता आपलं मन पूर्णत: त्या नाट्यगृहाच्या आत निर्माण झालेल्या वातावरणाशी एकरूप झालेलं असतं. अधीरता अगदी शिगेला पोचलेली असते. आणि मग, तिसरी घंटा होते आणि नाटक सुरू होतं... या प्रक्रियेतसुद्धा किती नाट्य आहे! पण हल्ली तेवढं बहुदा पुरत नसावं. म्हणून तिसरी घंटा होऊन नाटक सुरू झालं, तरी नाट्यगृहात वेगवेगळ्या घंटा वाजू लागतात. या घंटा असतात मोबाइलच्या... काही किणकिणत्या, काही गुणगुणत्या; पण बहुसंख्य ठणठणत्या अशा अनेकविध घंटा... त्या कधी वाजतात, तर कधी बंद होतात. आपल्या डोक्यात मात्र एक धोक्याची घंटा लगेच सुरू होते - आणि ती असते, नाटकाचा बेरंग होण्याची घंटा!
हल्ली हा अनुभव वारंवार यायला लागला आहे. केवळ नाट्यगृहांतच नव्हे, तर चित्रपटगृहांत, शास्त्रीय संगीताच्या मैफलीत किंवा अगदी चित्रप्रदर्शनांतही. आपल्याला एकाग्रपणे कुठल्याही कलाकृतीचा आस्वाद घेताच येणार नाही, याबद्दल प्रेक्षकांची आता खात्री पटत चालली आहे. याचं कारण आपल्या हातात आलेला मोबाइल नावाचा उपद्रव. वेळी-अवेळी वाजणाऱ्या मोबाइलच्या रिंगमुळे या सर्व ठिकाणी आपल्याला त्रास होऊ लागला आहे. प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी मोबाइल ‘सायलेंट मोड’वर टाकण्याची सूचना दिली जाते. मात्र, ती काही जणांना समजत तरी नाही किंवा ते दुर्लक्ष तरी करतात. असे लोक थोडेच असतात हे खरंय; पण त्यांच्यामुळं होणारा उपद्रव मात्र सगळ्यांना सहन करावा लागतो. हल्ली सुमीत राघवन आणि सुबोध भावे यांच्यासारख्या स्टार कलाकारांनी या मोबाइल उपद्रवाबद्दल सोशल मीडियातून आवाज उठवल्यामुळं तो पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे. त्यांच्या या भूमिकेवर समर्थनार्थ आणि विरोधात अशा दोन्ही बाजूंनी फैरी झडत आहेत. नाटक किंवा कुठलीही कलाकृती सादर होत असताना, प्रेक्षक म्हणून आपण काही मूलभूत नियम पाळले पाहिजेत, याबाबत काही दुमत नसावे. आम्ही तिकीट काढून नाटक बघतो, त्यामुळे आम्ही वाट्टेल तसे वागू, या सबबीला तर अर्थच नाही.  आपण अनेक सेवांसाठी पैसे मोजतो. ते पैसे त्या सेवांसाठी असतात; त्या बदल्यात आपण केवळ ती विशिष्ट सेवा विकत घेतलेली असते. सेवा देणारे लोक आपले नोकर होत नाहीत, ही गोष्ट अशा सबबी सांगणाऱ्यांनी ध्यानात ठेवायला हवी. ‘विमानाचं तिकीट काढलंय, पैसे मोजलेत म्हणून आता जरा पाच मिनिटं खिडकी उघडू द्या,’ असं म्हणून चालेल काय? किंवा हॉटेलमध्ये पैसे मोजले, म्हणून आपण तिथल्या प्लेट उचलून घरी आणत नाही. नाटकाचं तिकीट काढलंय, याचा अर्थ ती कलाकृती बघण्यासाठी मोजलेले ते दाम आहेत. त्या बदल्यात एक चोख कलाकृती सादर करण्याचं काम कलाकारांचं आहे. त्यामुळं कलाकारानं त्याच्या इतर वैयक्तिक अडचणी काहीही असल्या, तरी रंगमंचावर पाऊल ठेवल्यापासून ते पडदा पडेपर्यंत आपल्या भूमिकेत शिरून काम केलंच पाहिजे, ही अपेक्षा जेवढी रास्त, तेवढीच प्रेक्षकांनी त्या कलाकृतीचा सामुदायिक आस्वाद घेता येण्यासाठी केलेल्या नियमांचं पालन करण्याची अपेक्षाही योग्यच! 
जेव्हा या अपेक्षांना काही कारणांनी तडे जायला सुरुवात होते, तेव्हा खरी अडचण येते. जेव्हा या अपेक्षा उभयपक्षी मान्य असतात आणि दोघांकडूनही त्या व्यवस्थित पाळल्या जातात, तोवर सगळं छानच चाललेलं असतं. मात्र, हल्ली मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळं या अपेक्षा पूर्ण होणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. मोबाइल वापरणाऱ्या अनेक लोकांना तो वापरण्याच्या सभ्य पद्धती अजिबात माहिती नसतात. मुळात एखादी व्यक्ती नियम पाळते म्हटलं, की सगळेच नियम पाळते आणि नियम तोडणारे सगळीकडेच नियम तोडतात. समोरच्या खुर्चीवर पाय टाकून बसणे किंवा मागून लाथा मारणे इथपासून ते मध्यंतरात चहा-वड्याच्या स्टॉलवर ढकलाढकली करणे, अगदी स्वच्छतागृहातही किळस येईल अशा पद्धतीने वागणे अशा गोष्टी करणारे लोकच मोबाइल वाजविणाऱ्यांमध्ये आघाडीवर दिसतात. याशिवाय नाटकाला येणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असते. त्यांना मोबाइल नीट ‘सायलेंट मोड’वर टाकता येत नाही. फोन वाजला, की तो घेतलाच पाहिजे अशा मानसिकतेची ही पिढी आहे. नाटक सुरू असताना अचानक फोन वाजला, की त्यांची होणारी धांदल बघायची. वास्तविक, मोबाइल स्विच ऑफ करणे किंवा सायलेंट मोडवर टाकणे हे फारच सोपे काम आहे. ही पिढी आपल्या नातवांकडूनही ते सहज शिकू शकते. या लोकांकडून मुद्दाम हे घडत नाही, हे जेवढं खरं, तेवढंच हे घडू नये यासाठी ते प्रयत्नही करत नाहीत, हेही तितकंच खरं!
काही नाटकं अगदी टाइमपास स्वरूपाची, विनोदी असतात; तर काही गंभीर, रहस्यमय, गूढ अशी असतात. पहिल्या प्रकारच्या नाटकांच्या वेळी एखादा मोबाइल वाजला, तर कलाकारही फारशी हरकत घेत नाहीत. (खरं तर कुठल्याही वेळी मोबाइल वाजणं हे चुकीचंच...) मात्र, दुसऱ्या प्रकारची नाटकं सुरू असताना कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये एकतानता निर्माण व्हावी लागते. प्रेक्षक कलाकारांच्या जोडीनं त्या कथाभागामध्ये स्वत:ला गुंतवून घेत असतात. रंगमंचावर एक वातावरण तयार होत असतं. अशा वेळी नाटककारानं (‘ब्लॅक-आउट’व्यतिरिक्त) काही शांततेचे क्षण, काही विराम पेरलेले असतात. ती शांतता, ते विराम हे त्या नाटकाचेच, त्या कथानकाचेच भाग असतात. प्रेक्षकांनी त्या शांततेचा, त्या विरामांचाही आस्वाद घ्यायचा असतो. त्या क्षणापूर्वी घडलेलं नाट्य मेंदूत मुरवून घ्यायला जी थोडी उसंत हवी असते, ती मिळवून देण्याचं अतिरिक्त कामही हे विराम करीत असतात. अशा वेळी त्या शांततेचा गळा घोटत, कर्कशपणे मोबाइलची रिंग वाजते, तेव्हा काय उच्च प्रतीचा रसभंग होत असेल, याची कल्पना खरा नाटकवेडा करू शकतो.
असे रसभंगाचे प्रकार वारंवार का होत असावेत? जरा विचार करता, असं लक्षात येतं, की अलीकडे मोबाइलच्या अतिवापरामुळं आपल्या सगळ्यांचीच लक्ष एकाग्र करण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे आपण सलग एका जागी बसून, एकच एक गोष्ट करत बसण्याचे प्रसंग कमी झाले आहेत. मोबाइलवर आपल्याला हवा तसा, हवा त्या वेळी सिनेमा पाहण्याची सोय झाल्याने आपण थिएटरमध्येही तसाच सिनेमा बघण्याचा प्रयत्न करतो. ते शक्य न झाल्यास अस्वस्थ होऊन मोबाइल बाहेर काढतो. अनेकांना सतत आपल्याला कुणाचा फोन तर नाही ना आला, मेसेज तर नाही ना आला, हे अधूनमधून तपासण्याची सवय असते. नाटक सुरू असतानाही मग ही सवय अचानक सुटत नाही. केवळ फोनच्या आवाजानेच नाही, तर फोन बाहेर काढल्यावर त्याच्या स्क्रीनचा जो लाइट येतो, त्यानेही अनेकांना डिस्टर्ब होतं. पण काही काही निरागस जनांच्या हे अजिबातच लक्षात येत नाही. आता नाट्यगृहाच्या परिसरात जॅमर बसवा किंवा नाट्यगृहाबाहेर मोबाइलसाठी लॉकर सुरू करा, असे अनेक उपाय सुचविले जात आहेत. ते व्यवहार्य नाहीत. सुबोध आणि त्याच्या सहकाऱ्यांनी नाट्यगृहाच्या दरवाजावर उभं राहून सगळ्यांचे फोन तपासण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आता या सगळ्यांचीच तळमळ समजण्यासारखी असली, तरी हे तात्कालिक उपाय झाले. यामुळे तेवढ्यापुरता परिणाम होईल. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! हे दुर्दैवी असलं, तरी हेच खरं आहे. यावर स्वयंशिस्त हा एकच उपाय आहे. आपल्याला नाटकाचा आस्वाद सगळ्यांसोबत घ्यायचा असेल, तर मोबाइल पूर्णपणे स्विच ऑफ करून ठेवणे हा आणि हाच यावरचा एकमेव उपाय आहे. तसं झालं नाही, तर कलाकार असाच उद्वेग व्यक्त करत राहतील आणि आपण पुन्हा मोबाइलचे आवाज करीत नाटक पाहत बसू. खरी धोक्याची घंटा आहे ती हीच!

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, १ ऑगस्ट २०१९)

---