20 Mar 2022

‘काश्मीर फाइल्स’विषयी...

विच्छिन्न करणारा अनुभव...
---------------------------------


‘काश्मीर फाइल्स’ अखेर आज - २० मार्च रोजी - बघितला. डोकं सुन्न होऊन गेलं. एखाद्याच्या डोक्यावर बंदूक ठेवून त्याच्या मेंदूच्या ठिकऱ्या उडवता येतात, तसंच अशी एखादी कलाकृती दाखवून एखाद्याच्या मेंदूतही ठिकऱ्या उत्पन्न करता येतात. ‘काश्मीर फाइल्स’ हा तशा प्रकारचा सिनेमा आहे. प्रेक्षकाच्या डोक्याला वेगळ्या प्रकारे शॉट लावण्यात हा सिनेमा यशस्वी होतो. जनरली, कुठलाही सिनेमा बघण्यापूर्वी मी त्याविषयी काही वाचत किंवा ऐकत नाही. त्यामुळं पूर्वग्रहविरहित नजरेनं सिनेमा बघायला मदत होते. ‘काश्मीर फाइल्स’विषयी मात्र ठरवूनही काही कानावर न पडणं किंवा एकदमच अलिप्त राहणं शक्य नव्हतं एवढं त्याविषयी सर्वत्र लिहिलं जात होतं, बोललं जात होतं. तरीही माझ्या नेहमीच्या पद्धतीने जास्तीत जास्त तटस्थ राहून सिनेमा अनुभवण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही संवेदनशील माणसाचं काळीज हलून जाईल, असे अनेक प्रसंग या सिनेमात आहेत. काश्मीरमध्ये १९९० च्या १९ जानेवारी रोजी जे काही झालं, त्याचं प्रत्ययकारी चित्रण या सिनेमात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीनं केलंय. ते बघताना अंतर्बाह्य हादरून जायला होतं. आपल्याच देशात असं काही घडलं आहे आणि आपल्याला याबद्दल फार काही माहिती नाही, यामुळं एकाच वेळी शरम, अपराधगंड, चीड, संताप, उद्वेग आदी भावना मनात येऊन गेल्या.
एक सांगायला पाहिजे. मी स्वत: त्या वेळी १४-१५ वर्षांचा होतो. रोजचं वृत्तपत्र नेमानं वाचत होतो. तरी मला १९९० मध्ये काश्मीरमध्ये असं काही भयानक घडलंय याबद्दल तेव्हा तरी कुठं माध्यमात वाचल्याचं फारसं आठवत नाही. काश्मीरविषयीच्या बातम्या येत होत्या. मात्र, विशेषत: पंडितांबाबत जे काही घडलं, त्यावर फारसं कुठं काही आल्याचं किंवा कुणी काही बोलल्याचं मला तरी आठवत नाही. (हा माझा स्मरणदोषही असू शकतो.) यानंतर एकदम १६ वर्षांनी, म्हणजे २००६ मध्ये मी ‘इफ्फी’त अशोक पंडित यांनी दिग्दर्शित केलेली एक डॉक्युमेंटरी बघितली होती. त्या वेळी पंडित स्वत: तिथं आले होते आणि प्रेक्षकांशी बोलले होते. ती डॉक्युमेंटरी बघून पंडितांच्या प्रश्नाविषयी पहिल्यांदा नीट व सविस्तर कळलं होतं. पंडितांचं एकूण बोलणं, चीड, उद्वेग हा सगळा तेव्हा तरी मला ‘अरण्यरुदन’च वाटला होता. त्यानंतरही १६ वर्षं गेली आणि आता मूळ घटनेला ३२ वर्षं होऊन गेल्यानंतर हा सिनेमा आला आहे. त्याविषयीच्या कुठल्याही चांगल्या-वाईट प्रचाराला बळी न पडता, प्रत्येकानं तो स्वत: बघून काय ते मत ठरवलं पाहिजे. (या सिनेमाच्या नॅरेटिव्हला प्रतिवाद करणाराही सिनेमा कदाचित भविष्यात कुणी करील, तेव्हा तोही आवर्जून पाहिला पाहिजे.)

Spoiler alert

सिनेमात आपल्याला नक्की काय दाखवायचं आहे, याबाबत दिग्दर्शकाच्या मनात कुठलीही शंका नाही. त्यामुळं त्यानं घडलेल्या घटनांची एक कथामालिका गुंफून ती नाट्यमय रूपात आपल्यासमोर सादर केली आहे. पुष्करनाथ पंडित (अनुपम खेर) यांच्या घरात झालेल्या भयंकर घटनेच्या अनुषंगाने ही सर्व कथा आपल्यासमोर फ्लॅशबॅकने उलगडत जाते. कृष्णा (दर्शनकुमार) हा पुष्करनाथ यांचा नातू. तो १९९० ची घटना घडली तेव्हा अगदीच लहान असतो. पुष्करनाथ यांचे एके काळचे मित्र व सहकारी त्याला काश्मीरविषयी आणि त्याच्या कुटुंबाविषयी खरं काय घडलंय ते सांगतात. तोवर कृष्णा दिल्लीतील एएनयू (थोडक्यात जेएनयू) विद्यापीठातील प्रा. राधिका मेनन (पल्लवी जोशी) यांच्या संपर्कात आलेला असतो. त्या त्याला विद्यापीठाची निवडणूक लढवायला सांगतात. ‘काश्मीर हा मुळी भारताचा भागच नाही’ यावर मेननबाईंचा ठाम विश्वास असतो. काश्मीरमध्ये पंडितांचं सगळं शिरकाण घडवून आणणारा मास्टरमाइंड फारुक बिट्टा (चिन्मय मांडलेकर) (हे पात्र सरळच जेकेएलएफचा म्होरक्या यासीन मलिकवरून घेतलेलं दिसतं, असं मला वाटलं; पण ते बिट्टा कराटे नावाच्या दहशतवाद्यावरून बेतलं आहे, अशी माहिती समजली...) याच्याशीही मेननबाईंचं संधान आहे. कथानकाच्या ओघात मेननबाईंच्या रूपानं दिल्लीतील एका विशिष्ट वर्तुळाची आणि बिट्टाच्या रूपानं काश्मिरातील फुटिरतावाद्यांची अशा दोन्ही बाजू दिग्दर्शक व्यवस्थित फुटेज देऊन दाखवतो. (उलट कधी कधी जरा जास्तच फुटेज दिलंय असंही वाटून जातं.) 
या सर्व घटनाक्रमात काश्मिरी पंडितांची व्यथा सर्वांत ठळकपणे प्रेक्षकांच्या नजरेत यावी, याची काळजी मात्र दिग्दर्शकानं व्यवस्थित घेतली आहे. अगदी सुरुवातीच्या क्रिकेटच्या प्रसंगापासून काश्मीरमधील भयावह परिस्थितीची जाणीव आपल्याला करून दिली जाते. पुढं काय होणार, याची कल्पना असूनही प्रत्येक वेळी त्या घटनेची तीव्रता किंवा तिचा आघात आपल्या मनावर होईल, अशा पद्धतीनं सर्व प्रसंगांची रचना दिग्दर्शक करतो. यातील प्रमुख पात्रांच्या तोंडून वेगवेगळ्या प्रसंगांत काश्मीरचा इतिहास आपल्याला सांगितला जातो. (तो माझ्यासकट अनेकांना फारसा माहिती नसणार, याची खातरी आहे.) या प्रकारामुळं सिनेमाला क्वचित डॉक्युमेंटरीचं स्वरूप येतंही. मात्र, लगेचच कथानक पूर्वपदावर येतं आणि त्यातील नाट्यमयता कायम राहते, हेही मान्य करायला हवं.
काश्मिरी पंडितांची यात दाखविलेली फरपट आणि होरपळ पाहून कुठल्याही सहृदय माणसाचं काळीज पिळवटून जाईल, यात वाद नाही. आपल्या स्वत:च्या मालकीचं घर, जमीन, गाव, राज्य सोडून जाण्यासाठी कुणी तरी बंदुकीच्या जोरावर धमकावतं आहे, असा प्रसंग आपल्यावर कधीही आलेला नाही. त्यामुळं आपल्याला त्या दु:खाची जाणीव होणं खरं तर फार अवघड आहे. अशा वेळी सहानुभूती ही एकच भावना मनात येऊ शकते. मात्र, हा सिनेमा पाहताना आपल्याला वंशविच्छेदाचं भयावह रूप आणि विस्थापितांची वेदना काही अंशी तरी समजू शकते, हे या कलाकृतीचं मोठं यश म्हणायला हवं.

सिनेमाची प्रदीर्घ लांबी मला खटकली. अर्धा तास तरी हा सिनेमा नक्कीच कमी करता आला असता. आणखी एक खटकणारी गोष्ट म्हणजे ब्रह्मदत्त यांच्या घरात असलेल्या नकाशात काश्मीर संपूर्णपणे पाकिस्तानमध्ये दाखवलं आहे. ब्रह्मदत्त हे तर भारताच्या बाजूचे असतात. असं असताना त्यांच्या घरात असा नकाशा कसा? आणखी एक. पंडितांच्या छावणीला तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती महंमद सईद यांनी भेट दिली, त्या प्रसंगात 'महाराष्ट्रात बाळासाहेबांनी (ठाकरे) काश्मिरी पंडित मुलांना इंजिनीअरिंग कॉलेजांत जशा जागा राखीव ठेवल्यात तशा देशभर का नाही ठेवत?' असा प्रश्न एक तरुणी सईद यांना विचारताना दाखवली आहे. सईद गृहमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रात युतीचं सरकार नव्हतंच. ते नंतर १९९५ मध्ये आलं. त्यामुळं या प्रसंगात कालक्रमाची गडबड झालेली दिसते. असो.
या चित्रपटात अनुपम खेर आणि चिन्मय मांडलेकर या दोघांनीही कमाल अभिनय केला आहे. विशेषत: चिन्मयनं त्या खलनायकी भूमिकेचे सर्व कंगोरे जबरदस्त दाखवले आहेत. डोळ्यांची फडफड खासच! त्या तुलनेत ब्रह्मदत्त यांच्या भूमिकेतील मिथुन चक्रवर्ती मला तरी फार काही पटले नाहीत. पुनीत इस्सर, प्रकाश बेलवडी आणि अतुल श्रीवास्तव यांच्या रूपानं पोलिस, डॉक्टर व पत्रकार या तिघांचेही प्रतिनिधी हजर आहेत. त्यांच्यातली वाद-चर्चा कथानक पुढं नेण्यासाठी महत्त्वाची. मृणाल कुलकर्णी यांचं काम मोजकंच, पण लक्षात राहणारं आहे. सर्वांत जबरदस्त भूमिका केली आहे ती पल्लवी जोशी यांनी. राधिका मेननचं नॅरेटिव्ह पल्लवी जोशींनी ठसक्यात मांडलंय. कृष्णा झालेल्या दर्शनकुमारनं शेवटच्या त्या भाषणाच्या प्रसंगात सगळं जिंकून घेतलंय. चित्रपटाला संगीत स्वप्नील बांदोडकर यांचं आहे. पण यात गाणी हा प्रकार लक्षात राहणारा नाहीच.
चित्रपटात अर्थातच मोठ्या प्रमाणावर हिंसा आहे. (मला स्वत:ला पडद्यावर कुठलीही हिंसा बघताना फार त्रास होतो. या घटना सूचक पद्धतीनं दाखविल्यास अधिक परिणाम करून जातात, असं मला स्वत:ला वाटतं. लहान मुलांची हत्या कुठल्याही परिस्थितीत सेन्सॉरसंमत व्हायला नको खरं तर... पण असो.) या सिनेमात रक्तरंजित हिंसेला पर्याय नव्हताच हे माहिती होतं. त्यामुळं कमालीचा त्रास झाला. (तो तसा व्हावा अशीच दिग्दर्शकाची अपेक्षा आहे.) 
काश्मीरमध्ये १९९० मध्ये झालेल्या या अत्याचारांविषयी गेली ३२ वर्षं कुणीही फार बोललं नाही किंवा मुख्य प्रवाहातल्या माध्यमांत त्याची फार चर्चा झाली नाही, अशी दिग्दर्शकाची मांडणी यात आहे. ते बऱ्याच अंशी खरंही आहे. काश्मिरी पंडितच काय, एकूणच देशातल्या कुठल्याही पीडित, शोषित वर्गाविषयी उर्वरित देशातील बहुसंख्य जनतेला फार काही पडलेलं आहे, असं मला तरी वाटत नाही. आपल्या देशात आर्थिक उदारीकरणानंतर, त्यातही २००० नंतर मध्यमवर्ग सुखासीन झाला. महानगरं गर्दीनं फुगू लागली. आपण सारेच आपल्याभोवती सुखाचा छोटासा कोष विणून त्यात रममाण झालो. वास्तविक त्यापूर्वी मध्यमवर्ग हाच देशातल्या सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज होता. तो कामगार चळवळीत होता, तो महिलांच्या हक्कांसाठी अग्रगण्य होता, तो दलित-शोषितांच्या दु:खानं कळवळत होता... मात्र, बाजार नावाच्या गोष्टीनं आपण आपल्या जवळच्या नातेवाइकांना विसरलो, तिथं काश्मिरी पंडित कोण? आपल्या या सुखासीनतेला, त्यातून आलेल्या कोमट-पांचट उदासीनतेला मारलेली ही सणसणीत चपराक आहे. शरमेनं तोंड लपवून बसावं अशा किती तरी घटना या देशात घडून गेल्या, घडत आहेत आणि घडत राहतीलही. काश्मिरी पंडितांची समस्या ही नक्कीच त्यातली एक आहे. त्याविषयी या चित्रपटानं आपल्या मनात अपराधगंडाची बारीकशी टोचणी लावली तरी ते या कलाकृतीचं सर्वांत मोठं यश ठरेल. केवळ शंभर कोटी मिळविले किंवा अनेक लोकांनी इतर अनेकांना वेगवेगळ्या माध्यमांतून हा सिनेमा बघण्याचा आग्रह धरला हे काही त्या सिनेमाचं खरं यश नव्हे. आपल्यात काय बदल होतो, देशातल्या इतर सर्व अशा लाजिरवाण्या घटनांविषयी आपण तितकेच संवेदनशील राहणार का, की केवळ निवडक घटनांमध्येच आपली संवेदनशीलता उफाळून येणार यावर आपलं माणूसपण अवलंबून असेल. ‘काश्मीर फाइल्स’नं आपल्याला त्या माणूसपणाच्या मार्गावर ढकललं आहे, हे त्याचं फार मोठं यश मला वाटतं. पुढं जायचं की नाही हा सर्वस्वी आपला निर्णय!
या देशात कुठल्याही समाजघटकावर अन्याय होता कामा नये, सर्वांना समान आणि घटनादत्त अधिकारानुसार वागणूक मिळाली पाहिजे, ही अपेक्षा अवाजवी नसावी. या सिनेमात तेच दाखवलं आहे. अन्याय झालेल्या समाजघटकाला आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तोच इथं दिग्दर्शकानं काश्मिरी पंडितांसाठी बजावलेला दिसतो. हा सिनेमा पूर्वग्रहविरहित नजरेनं पाहणं फार आवश्यक आहे. कुठलंही एक नॅरेटिव्ह किंवा एक मांडणी मनात ठेवून हा सिनेमा पाहायला जाणं म्हणजे त्या कलाकृतीशीही प्रतारणा केल्यासारखं होईल. (हे खरं तर सर्वच कलाकृतींना लागू आहे.)
तेव्हा ‘काश्मीर फाइल्स’ नक्की पाहा. हा सुन्न करणारा अनुभव घेताना आपण दुसऱ्यांच्या दु:खाप्रती कायम अधिक संवेदनशील झालो, तर त्यापेक्षा या चित्रपटाचं मोठं यश दुसरं नसेल.

---

15 Mar 2022

‘गंगूबाई काठियावाडी’विषयी...

हंस जैसी सफेद...
-------------------


गंगूबाई काठियावाडी हे नाव यापूर्वी ऐकलंच नव्हतं, असं नाही. पण तिच्याविषयी फार माहिती नक्कीच नव्हती. कधी जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नव्हता. प्रसिद्ध पत्रकार एस. हुसैन झैदी यांचं ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ हे पुस्तक आल्याचं माहिती होतं. मात्र, ते अजून वाचलेलं नाही. संजय लीला भन्साळी गंगूबाईच्या जीवनावर चित्रपट तयार करतोय, हे ऐकत होतो. तो पाहायची उत्सुकताही होती. अखेर आज - १५ मार्च रोजी - तो योग आला. फर्स्ट थिंग फर्स्ट! ‘गंगूबाई काठियावाडी’ हा संपूर्ण चित्रपट आलिया भटचा आहे. तिच्या पात्राप्रमाणेच तिनं या कलाकृतीवर अक्षरश: राज्य केलं आहे. ‘भूमिका जगणं’ या वाक्प्रचाराचाही ‘क्लिशे’ झाला आहे, हे मान्य आहे; तरीही आलियाच्या बाबतीत पुन्हा हाच शब्दप्रयोग करण्याखेरीज पर्याय नाही, इतका हा तिचा सिनेमा आहे. संजय लीला भन्साळींचे चित्रपट म्हणजे भव्य-दिव्य, रंगीतसंगीत, चकाचक असा सगळा प्रकार. इथं मुंबईतल्या कामाठीपुऱ्यातलं वेश्याजीवन दाखवायचं असलं, तरी भन्साळींना तेही चकचकीत दाखवण्याचा मोह आवरलेला नाहीच. फक्त एवढंच म्हणता येईल, की त्यांनी तुलनेनं पुष्कळ संयम पाळण्याचा प्रयत्न केलेला जाणवतो. त्याचा या सिनेमाला फायदाच झालेला आहे. 
वेश्याव्यवसाय हा जगातला सर्वांत प्राचीन व्यवसाय असं मानलं जातं. कुठलीही स्त्री स्वेच्छेने या व्यवसायात येत नाही. बळजबरीनं या व्यवसायात ढकललेल्या स्त्रीच्या यातना आणि तिचं नरकासमान जगणं यांचं वर्णन शब्दांत करणं शक्य नाही. माणसाच्या सर्व संवेदना गोठून संपून जाव्यात, असं जगणं काही स्त्रियांच्या वाट्याला येतं. ‘गंगा जमनादास काठियावाडी’ (आलिया) या नावाच्या, बॅरिस्टर पित्याच्या कन्येच्या आयुष्यातही काही वेगळं घडलं नाही. रमणिक नावाच्या एका तरुणाच्या प्रेमात पडलेली ही सुंदर तरुणी चित्रपटात नायिका होण्याच्या आशेनं मुंबईत येते. तिचा प्रियकर हा प्रत्यक्षात तिला विकणारा दलाल निघतो. अपेक्षाभंग आणि विश्वासघाताचं महाभयंकर दु:ख वाट्याला आलेल्या गंगाचं रूपांतर लवकरच ‘गंगू’ आणि नंतर ‘गंगूबाई’मध्ये होतं. हा सर्व १९५५-६० चा काळ. तेव्हाच्या मुंबईत कामाठीपुरा भागात सुमारे चार हजार वेश्या काम करत होत्या. त्यातल्या शीला नावाच्या ‘मौसी’कडं गंगाला विकण्यात येतं. आधी परिस्थितीपुढं हतबल झालेली, गांजलेली, दुबळी गंगा हळूहळू तीव्र जीवनेच्छेच्या जोरावर स्वत:ची ओळख प्रस्थापित करू पाहते. त्यातल्या त्यात शिकलेली, वाचू शकणारी असल्यानं इतर मुलींचं पुढारपण आपोआपच तिच्याकडं येतं. 
गंगूबाई हळूहळू कामाठीपुऱ्याची अनभिषिक्त पुढारीण होते. हा संघर्ष सोपा नसतो. एका भीषण प्रसंगाला तोंड द्यावं लागल्यानंतर ती मुंबईचा तत्कालीन एकमेव डॉन करीम लाला (सिनेमात रहीम लाला - अजय देवगण) याची भेट घेते. त्याच्याशी बहिणीचं नातं जोडते. कामाठीपुऱ्यातला दारूचा धंदा चतुराईनं ताब्यात घेते. तिथल्या रजियाबाई (विजयराज) या तृतीयपंथीचं वर्चस्व संपविण्यासाठी अनेक क्लृप्त्या करते. अखेर रजियाबाईला हरवून गंगूबाई निवडणूक जिंकते. या प्रवासात तिला एका अमीन फैजी पत्रकाराची (जिम सरभ) साथ लाभते. आता तिला आझाद मैदानावर भाषणासाठी बोलावलं जातं. गंगूबाई पहिल्यांदाच कामाठीपुऱ्याच्या बाहेर पडून, ‘सभ्य समाजाच्या’ मेळाव्यात भाषण ठोकते. तिचं हे भाषण म्हणजे संपूर्ण सिनेमाचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल. गंगूबाई आपल्या रांगड्या भाषेत समोरच्या कथित सभ्य समाजाचं निराळ्या अर्थानं वस्त्रहरण करते. कामाठीपुऱ्यातल्या महिला आणि त्यांचं हित या एकाच तळमळीनं गंगूबाई कामाला लागते. या वस्तीशेजारी असलेली शाळा आणि तिचे संचालक ही वस्ती हटविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढतात. गंगूबाईला तिची वस्ती वाचवायची असते. स्थानिक पुढारी आता तिच्याकडं मदतीला येऊ लागतात. गंगूबाईला त्यातून तत्कालीन पंतप्रधान नेहरूंना भेटण्याची संधी मिळते. गंगूबाई आणि नेहरूंची भेट हादेखील या सिनेमाचा हायलाइट म्हणावा लागेल.

संजय लीला भन्साळीनं गंगूबाईचं हे सगळं जगणं अतिशय प्रभावीपणे दाखवलंय. अगदी सुरुवातीला एका लहान मुलीची ‘नथ उतरविण्याच्या’ भयंकर प्रसंगापासून चित्रपट पकड घेतो. चित्रपटाचं कलादिग्दर्शन उच्च दर्जाचं आहे. साठच्या दशकातली मुंबई उत्तम साकारली आहे. कामाठीपुरा आणि तिथल्या जुनाट गल्ल्या, अंधारे जिने, पोपडे उडालेल्या खोल्या आणि डोळ्यांतला उजेड विझलेल्या बायका हे सगळं भन्साळींच्या कॅमेऱ्यानं उत्तम टिपलंय. यात प्रमुख वाटा अर्थात आलिया भटचा. ती पहिल्या दृश्यापासूनच या भूमिकेत शिरली आहे. गंगूबाईची अवहेलना, उद्वेग, लाचारी; तिचा उद्दामपणा, करारीपणा, जिगर, प्रेमळपणा, भावूकपणा, खुनशीपणा, रंगेलपणा, नखरेलपणा हे सगळं सगळं आलियानं अतिशय जबरदस्त साकारलं आहे. या भूमिकेसाठी तिच्यावर अनेक पुरस्कारांचा वर्षाव होणार हे नक्की.
यातलं रजियाबाई हे तृतीयपंथीयाचं पात्र साकारणारा विजयराज हा एक भन्नाट कलाकार आहे. मी त्याला ‘रघू रोमिओ’पासून पाहतोय. बऱ्याच काळानं त्याच्या क्षमतेला न्याय देणारी ही भूमिका त्याच्या वाट्याला आली आहे. (काही प्रसंगांत ‘सडक’मधली ‘महारानी’ साकारणाऱ्या सदाशिव अमरापूरकरांची आठवण आली.) रजियाबाईचा सगळा तोरा, नखरा विजयराजनं एकदम खास सादर केला आहे. रहीम लालाच्या भूमिकेत अजय देवगण अगदी परफेक्ट! जवळपास पाहुण्या कलाकारासारखी ही भूमिका आहे, पण त्यातही अजय आपली छाप पाडतोच. याशिवाय छाया कदम, शंतनू महेश्वरी, इंदिरा तिवारी, सीमा पाहावा हे कलाकारही आपापली भूमिका चोख करतात. गंगूबाई अफसान या तरुणाच्या प्रेमात पडते, असा एक ट्रॅक सिनेमात आहे. त्यासाठी दोन गाणीही येतात. गंगूबाईमधली प्रेमाची भुकेली स्त्री दाखविण्यासाठी या ट्रॅकचा उपयोग दिग्दर्शकानं केला आहे.
या चित्रपटात नेहरूंची भूमिका राहुल वोहरा या अभिनेत्याने केली आहे. ती निवड मात्र फसली आहे. आपल्या देशात रोशन सेठ ते दलिप ताहिल अशी ‘नेहरू’ साकारणाऱ्या अभिनेत्यांची परंपरा आहे. सध्या यातले दलिप ताहिल उपलब्ध असताना त्यांनाच ही भूमिका देणे इष्ट ठरले असते. याशिवाय पंतप्रधानांच्या या भेटीत खऱ्या गंगूबाईने त्यांना ‘तुमचं आडनाव मला द्या, मग सर्व गैरधंदे सोडते,’ अशा आशयाचं काही तरी सुनावलं होतं, असा एक किस्सा ऐकण्यात आहे. मात्र, या सिनेमात गंगूबाई-नेहरू भेटीच्या दृश्यात या संवादाचा समावेश नाही. तर ते एक असो.
चित्रपटातले गंगूबाईच्या तोंडचे सर्व संवाद खटकेबाज आहेत. अनेक प्रसंगांत गंगूबाईचे संवाद टाळ्या घेतात. संवादलेखक प्रकाश कापडिया आणि उत्कर्षिणी वशिष्ठ या दोघांना त्यांचं श्रेय द्यायला हवं.
संजय लीला भन्साळीनं गंगूबाई नावाच्या कामाठीपुऱ्यातल्या एका जबरदस्त बाईवर उभा केलेला हा चित्रपट पाहायला हवा तो आलिया भटच्या अदाकारीसाठी. वेश्याव्यवसायातील महिलांचं जगणं समजून घेण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे साठच्या दशकात मुंबई महानगरात अशी कुणी तरी एक बाई होती आणि तिनं वेश्यागृहांत पिचत पडलेल्या हजारो महिलांच्या आयुष्याला आवाज दिला हे जाणण्यासाठी!
काळाच्या उदरात गडप झालेल्या अशा अनेक लढवय्या स्त्रिया असतील. त्यांचं चारित्र्य, कर्तृत्व, पेशा, वकूब याविषयी ‘जजमेंटल’ न होता, अगदी तटस्थपणे, पण संवेदनशीलतेनं त्यांचा संघर्ष समजून घेणं ही अंतिमत: आपल्या माणूसपणाची वरची यत्ता ठरते. संजय लीला भन्साळीला धन्यवाद द्यायचे ते अशा एका महिलेचं जगणं त्यानं आपल्यासमोर आणलं म्हणून! या चित्रपटात एक प्रसंग आहे. अफसान गंगूबाईला साड्या निवडायला सांगतो. सर्व साड्या पांढऱ्याच असतात. तेव्हा यात काय निवडणार, असा प्रश्न तो गंगूबाईला करतो. तेव्हा ती शुभ्र रंगाचे शंभर प्रकार सांगून हा निवडू की तो, तो निवडू की आणखी तो... असं विचारते. तेव्हा अफसान म्हणतो, हंसवाला सफेद चुनो!
गंगूबाईसारख्या बाईच्या जगण्यातलं सगळं सार यात आलं आहे!


---

14 Mar 2022

‘झुंड’विषयी...

 भिंत ओलांडताना...
------------------------


नागराज मंजुळे हा माझा आवडता दिग्दर्शक आहे. त्याच्या बहुतेक कलाकृती मी पाहिल्या आहेत आणि त्या आवडल्याही आहेत. अगदी ‘फँड्री’पासून ते ‘वैकुंठ’पर्यंत! हा कविमनाचा दिग्दर्शक चित्रभाषेचा उत्तम वापर करून त्याला जे काही सांगायचं आहे ते नेमकं आणि स्पष्टपणे सांगत आलाय. त्याचं हे सांगणं तसं त्रासदायक आहे. ती नुसती करमणूक कधीच नसते. त्याच्या कलाकृती आपल्याला प्रश्न विचारतात - अगदी डोळ्यांत डोळे घालून प्रश्न विचारतात. त्यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याकडं नसतात. ती उत्तरं आपल्याकडं नसणं हा नेहमीच आपला दोष नसतो. पण आपल्यापैकी जी संवेदनशील मनं आहेत, निदान ती तरी त्यावर विचार करू लागतात. याच कारणांमुळं नागराजच्या कलाकृती पाहणं ही कायमच वैचारिक खाद्य पुरवणारी गोष्ट असते. नागराज ‘झुंड’ नावाचा हिंदी सिनेमा करतोय आणि त्यात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहे, हे कळल्यावर मात्र मी थोडा सचिंत झालो होतो. दोन कारणं होती. एक, ‘सैराट’च्या तुफान यशानंतर हा दिग्दर्शक हिंदीत प्रवाहपतित होतो की काय, ही भीती आणि दुसरं म्हणजे भाषा हे नागराजचं महत्त्वाचं माध्यम असल्यानं ती बदलल्यानं त्याचा संदेश पातळ होतो की काय, ही दुसरी भीती! त्यातच ‘झुंड’ प्रदर्शित झाला आणि त्याविषयी वेगवेगळं कानी येऊ लागलं. मी स्वत: सिनेमा पाहीपर्यंत त्याबद्दलचं काहीही लिहिलेलं वाचणं, ऐकणं टाळतो. पूर्वग्रहविरहित नजरेनं सिनेमा पाहता यावा एवढाच त्यामागं हेतू असतो. त्यामुळं जरा निवांत, उशिरा - म्हणजे आज - १४ मार्च रोजी हा सिनेमा पाहिला. बघितल्यावर सर्वप्रथम हे सांगितलं पाहिजे, की माझ्या मनात ज्या दोन्ही भीती होत्या, त्या अगदी फोल ठरल्या आणि त्याचा मला मनापासून आनंद झाला. नागराजचा हा सिनेमाही ‘स्टार्ट टु एंड’ नागराजचाच सिनेमा आहे आणि तो हिंदी भाषेत काय, अगदी झुलू भाषेत काढला असता, तरी तो तितकाच प्रभावी ठरला असता, असंही वाटून गेलं.
ही कहाणी एका खऱ्या घटनेवर आधारित आहे, हे मी वाचलं होतं. नागपूरचे विजय बारसे यांनी झोपडपट्टीतल्या मुलांना एकत्र आणून त्यांची फुटबॉल टीम तयार केली आणि या दरम्यान या मुलांची आयुष्यंही बदलवून टाकली, अशी ही ‘वनलायनर’ कथा. नागराजला ती का आवडली असावी आणि मोठ्या पडद्यावर का मांडावीशी वाटली असावी, हे या विषयावरून सहज लक्षात येतं. समाजातील दुर्लक्षित, वंचित, उपेक्षित वर्गाचं जगणं आणि त्यांचा जगण्यातला संघर्ष मांडणं या दिग्दर्शकाला आवडतं. ती त्याची सहज प्रवृत्ती आहे. इथं या संघर्षाला कॅनव्हास आहे तो फुटबॉलचा. आता इथं खेळ क्रिकेट नसून, फुटबॉल आहे हेही फार महत्त्वाचं. फुटबॉल हा श्रीमंत खेळ नाही. कुणीही तो खेळू शकतो. त्यामुळंच दक्षिण अमेरिका, आफ्रिका येथील गरीब देशांतही हा खेळ तुफान लोकप्रिय आहे. तिथंही अगदी झोपडपट्टीतून येऊन मोठा खेळाडू झालेल्या अनेक कहाण्या आहेत. 
नागपूर शहरातल्या गद्दी गोदाम या झोपडपट्टीतून ही कथा सुरू होते. कथेतील महत्त्वाची पात्रं ही अगदी कोवळी, तरुण मुलं आहेत. ती फाटकी आहेत. अतिशय गरिबीत राहतात. चोऱ्यामाऱ्या करतात. मारामाऱ्या करतात. नशापाणी करतात. थोडक्यात, ‘गंदी नाली के क़ीडे’ असं कुणीही म्हणावं असंच त्यांचं आयुष्य आहे. या मुलांच्या आयुष्यात योगायोगानं विजय बोराडे सर (अमिताभ) येतात आणि त्यांचं आयुष्य बदलतं. नागराज अगदी तब्येतीत, सावकाशीनं हा सगळा संघर्षाचा प्रवास रेखाटतो. एखादी ठाय लयीतली शास्त्रीय बंदिश चालावी, तसं हे चित्रण येतं. त्यामुळं सिनेमाचा कालावधीही तब्बल तीन तासांचा आहे. मात्र, अगदी मोजके क्षण वगळले तर तो कुठेही कंटाळवाणा होत नाही, हे दिग्दर्शकाचं यश आहे. मला वैयक्तिकरीत्या मात्र तो अजून किमान अर्ध्या तासानं कमी करता आला असता, असं वाटलं.

या सिनेमात पहिल्या प्रसंगापासूनच या संघर्षाची बीजं दिग्दर्शक रोवतो. एकेका व्यक्तिरेखेला सावकाश प्रस्थापित करतो. यातली एक मुस्लिम तरुणी तिला सतत त्रास देणाऱ्या पतीला सोडून, आपल्या तीन मुलींना घेऊन घराबाहेर निघते आणि ‘तू क्या मुझे तलाक देगा? मै ही तुझे तलाक देती हूँ’ असं म्हणून तीनदा ‘तलाक’ म्हणते आणि तिथून निघून जाते इथूनच या बंडखोर कथेला प्रारंभ होतो. या झोपडपट्टीतली मुलं, त्यांची अतिशय शिवराळ भाषा, भडक कपडे, रंगीबेरंगी केस यांसकट त्यांचं सगळं कठीण जगणं दिग्दर्शक आरसा धरल्यासारखा दाखवीत राहतो. हे सगळं आपण आपल्या आजूबाजूला नक्कीच पाहिलेलं असतं. अनेकदा आपण अशा वस्तीतून गेलेलोही असतो. मात्र, तिथं थांबून तिथल्या माणसांकडं नीट बघणं आपल्याला कधी जमलेलं नसतं, तर त्यांच्याशी बोलणं किंवा त्यांच्याशी मैत्री ही तर फार दूरची गोष्ट. बोराडे सर नेमकं हेच करतात. एका प्रसंगामुळं त्यांचा या मुलांशी सामना होतो आणि त्यांची पावलं नकळत या झोपडपट्टीकडं वळतात. एका कॉलेजमध्ये फुटबॉल प्रशिक्षक असलेल्या बोराडे सरांना या मुलांच्या पायांत असलेलं फुटबॉलचं अद्भुत कसब दिसतं. सुरुवातीला ते चक्क पैसे देऊन या मुलांना फुटबॉल खेळायला लावतात. हळूहळू मुलांमध्ये आणि त्यांच्यात मैत्री होते. अखेर त्यांच्याच कॉलेजच्या टीमला ही टीम हरवते आणि तिथून त्यांच्या एका आगळ्यावेगळ्या प्रवासाला सुरुवात होते. या प्रवासाची कथा म्हणजे सिनेमाचा उत्तरार्ध आहे. मध्यंतरात येणारं डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं गाणं आणि अमिताभचं बाबासाहेबांसमोर नतमस्तक होणं हे फार सूचक आहे.
उत्तरार्धात कथेत आणखी पात्रं येतात. संघर्ष आणखी टोकदार होतो. झोपडपट्टीतल्या प्रमुख पात्रांसोबत आता आपलीही ‘ना‌‌ळ’ जुळलेली असते. त्यांच्या ‘सैराट’पणावर आपणही फिदा होऊ लागतो. त्यांच्या जगण्यातल्या संघर्षाला हळहळतो, त्यांच्या छोट्याशा विजयाला टाळ्या पिटतो. पात्रांमधली आणि आपल्यामधली भिंत हळूहळू कोसळू लागते. उत्तरार्धात दिग्दर्शकाचा उपरोध, उपहास आणखी बोचरा होतो. या देशात सामान्य माणसाची किंमत काय, तर त्याचं ओळखपत्र असलेला एक कागद. तोच जर नसेल तर त्या माणसाचं अस्तित्वही हा देश मानणार नाही, हे उघडंवाघडं सत्य दिग्दर्शक काही प्रसंगांतून समोर मांडतो. नागराजच्या सिनेमांमध्ये क्लायमॅक्सला महत्त्व आहे. या सिनेमात तो मुंबई विमानतळावरच्या प्रसंगात येतो. हा प्रसंगही उत्तम आणि पुरेसा सूचक आहे. मात्र, नागराजच्या आधीच्या सिनेमांसारखा तो सणसणीत आणि गोळीबंद नाही. पण या सिनेमाची ती कदाचित गरजही नाही. आपल्या प्रमुख पात्रांनी भिंत ओलांडण्याची प्रतीकात्मक कृती सिनेमाला दोन्ही अर्थानं ‘उच्च’ पातळीवर नेते.
या सिनेमात अमिताभ बच्चनचं असणं वेगवेगळ्या अर्थांनी महत्त्वाचं आहे. त्यात दिग्दर्शकाची काही वैयक्तिक भावना असणं हा भाग बाजूला ठेवला तरी अमिताभसारख्या पडद्याबाहेर ‘लार्जर दॅन लाइफ’, ‘महानायक’ अशी प्रतिमा असणाऱ्या मोठ्या अभिनेत्यानं यातली बोराडे सरांची भूमिका साकारणं खूपच प्रतीकात्मक ठरलं आहे. वास्तविक अमिताभचं वय त्या पात्राच्या वयापेक्षा नक्कीच अधिक असणार. मात्र, अमिताभच्या जागी अनिल कपूर किंवा जॅकी श्रॉफ किंवा अक्षयकुमार किंवा अजय देवगण अशा त्या पात्राच्या खऱ्या वयाच्या अभिनेत्याचा विचार केला तरी अमिताभचं तिथं असणं आणि प्रत्यक्षात सिनेमात त्याचं बोराडे सरांच्या रूपात दिसणं किती महत्त्वाचं आहे, हे लक्षात येईल. (त्यातल्या त्यात शाहरुख खाननं ही भूमिका उत्तम केली असती, असंही एकदा वाटून गेलं. पण ते असो.) अमिताभच्या इमेजमुळं आणि वयामुळंही त्या भूमिकेला आलेली एक गोड स्वीकारार्हता या सिनेमाच्या यशाचा मोठा घटक आहे, हे निश्चित!
बाकी इतर प्रमुख भूमिकांमध्ये किशोर कदम, छाया कदम हे नागराजचे आवडते कलाकार यात दिसतात. आमचे नाना, म्हणजे रामदास फुटाणे यांना छोट्याशा भूमिकेत अमिताभसोबत काम करताना बघणं सुखावह आहे. आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरूही आहेत. मात्र, त्यांना तुलनेत फार चांगल्या भूमिका मिळालेल्या नाहीत. ‘फँड्री’मधला जब्या, म्हणजेच सोमनाथ अवघडे हाही यात एका भूमिकेत दिसतो. सर्वांत कौतुक करायचं ते डॉन झालेल्या अंकुश गेडामचं. तो या सिनेमाचा सर्वार्थाने नायक आहे. अगदी पहिल्या दृश्यापासून हा मुलगा आपली नजर वेधून घेतो. प्रसंगी त्याचा रागही येतो. मात्र, सर्व सिनेमावर या डॉनची छाप आहे हे निर्विवाद. सायली पाटीलनं तिची भूमिका चोख केली आहे. तिच्यातला आणि डॉनमधला रोमँटिक ट्रॅक मस्त आहे. बाकी भूमिकांत राजिया सुहैल, अँजेल अँथनी, कार्तिक उइके, प्रियांशू ठाकूर, जसप्रीतसिंग रंधवा या सर्वच नव्या आणि ‘रॉ’ मुलांनी कमाल केली आहे. अजय-अतुलचे संगीत नेहमीप्रमाणेच ढंगदार. मात्र, सिद श्रीरामचे ‘बादल से दोस्ती’ या गाण्याव्यतिरिक्त बाकी गाणी माझ्या तरी लक्षात राहिली नाहीत. साकेत कानेटकर यांचे पार्श्वसंगीत आणि सुधाकर यंकटी रेड्डी याचं छायाचित्रण अव्वल दर्जाचं!
हा सिनेमा सर्वांनी नक्कीच पाहायला पाहिजे. आपल्या स्वत:च्या मनात असलेल्या अनेक भयांवर, न्यूनगंडांवर मात करण्यासाठी बघायला हवा. आपल्याच आजूबाजूला असलेलं उपेक्षितांचं जग नीट जाणून घेण्यासाठी बघायला हवा. आपल्यातल्या आणि त्यांच्यातल्या अंतराची जाण आणि भान येण्यासाठी बघायला हवा. मधली ती मोठी भिंत ओलांडण्यासाठी ते आवश्यक आहे.

...

जाता जाता - एक अगदी सूक्ष्म, पण मला खटकलेला मुद्दा. या सिनेमाच्या श्रेयनामावलीत नागराजनं त्याचं नाव ‘मंजुले’ असं का लिहिलं आहे? हिंदी सिनेमा आहे म्हणून? हिंदीने आता ‘‌‌ळ’ स्वीकारला आहे. आणि नसला स्वीकारला तरी नागराजनं त्याचं आडनाव बदलण्याचं काहीच कारण नाही. ‘आयडेंटिटी’साठी लढणारा, भांडणारा दिग्दर्शक म्हणून नागराजची ओळख आहे, त्या पार्श्वभूमीवर हा विरोधाभास गमतीशीर वाटला.

---



-----------------------------------------