14 Mar 2022

‘झुंड’विषयी...

 भिंत ओलांडताना...
------------------------


नागराज मंजुळे हा माझा आवडता दिग्दर्शक आहे. त्याच्या बहुतेक कलाकृती मी पाहिल्या आहेत आणि त्या आवडल्याही आहेत. अगदी ‘फँड्री’पासून ते ‘वैकुंठ’पर्यंत! हा कविमनाचा दिग्दर्शक चित्रभाषेचा उत्तम वापर करून त्याला जे काही सांगायचं आहे ते नेमकं आणि स्पष्टपणे सांगत आलाय. त्याचं हे सांगणं तसं त्रासदायक आहे. ती नुसती करमणूक कधीच नसते. त्याच्या कलाकृती आपल्याला प्रश्न विचारतात - अगदी डोळ्यांत डोळे घालून प्रश्न विचारतात. त्यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याकडं नसतात. ती उत्तरं आपल्याकडं नसणं हा नेहमीच आपला दोष नसतो. पण आपल्यापैकी जी संवेदनशील मनं आहेत, निदान ती तरी त्यावर विचार करू लागतात. याच कारणांमुळं नागराजच्या कलाकृती पाहणं ही कायमच वैचारिक खाद्य पुरवणारी गोष्ट असते. नागराज ‘झुंड’ नावाचा हिंदी सिनेमा करतोय आणि त्यात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहे, हे कळल्यावर मात्र मी थोडा सचिंत झालो होतो. दोन कारणं होती. एक, ‘सैराट’च्या तुफान यशानंतर हा दिग्दर्शक हिंदीत प्रवाहपतित होतो की काय, ही भीती आणि दुसरं म्हणजे भाषा हे नागराजचं महत्त्वाचं माध्यम असल्यानं ती बदलल्यानं त्याचा संदेश पातळ होतो की काय, ही दुसरी भीती! त्यातच ‘झुंड’ प्रदर्शित झाला आणि त्याविषयी वेगवेगळं कानी येऊ लागलं. मी स्वत: सिनेमा पाहीपर्यंत त्याबद्दलचं काहीही लिहिलेलं वाचणं, ऐकणं टाळतो. पूर्वग्रहविरहित नजरेनं सिनेमा पाहता यावा एवढाच त्यामागं हेतू असतो. त्यामुळं जरा निवांत, उशिरा - म्हणजे आज - १४ मार्च रोजी हा सिनेमा पाहिला. बघितल्यावर सर्वप्रथम हे सांगितलं पाहिजे, की माझ्या मनात ज्या दोन्ही भीती होत्या, त्या अगदी फोल ठरल्या आणि त्याचा मला मनापासून आनंद झाला. नागराजचा हा सिनेमाही ‘स्टार्ट टु एंड’ नागराजचाच सिनेमा आहे आणि तो हिंदी भाषेत काय, अगदी झुलू भाषेत काढला असता, तरी तो तितकाच प्रभावी ठरला असता, असंही वाटून गेलं.
ही कहाणी एका खऱ्या घटनेवर आधारित आहे, हे मी वाचलं होतं. नागपूरचे विजय बारसे यांनी झोपडपट्टीतल्या मुलांना एकत्र आणून त्यांची फुटबॉल टीम तयार केली आणि या दरम्यान या मुलांची आयुष्यंही बदलवून टाकली, अशी ही ‘वनलायनर’ कथा. नागराजला ती का आवडली असावी आणि मोठ्या पडद्यावर का मांडावीशी वाटली असावी, हे या विषयावरून सहज लक्षात येतं. समाजातील दुर्लक्षित, वंचित, उपेक्षित वर्गाचं जगणं आणि त्यांचा जगण्यातला संघर्ष मांडणं या दिग्दर्शकाला आवडतं. ती त्याची सहज प्रवृत्ती आहे. इथं या संघर्षाला कॅनव्हास आहे तो फुटबॉलचा. आता इथं खेळ क्रिकेट नसून, फुटबॉल आहे हेही फार महत्त्वाचं. फुटबॉल हा श्रीमंत खेळ नाही. कुणीही तो खेळू शकतो. त्यामुळंच दक्षिण अमेरिका, आफ्रिका येथील गरीब देशांतही हा खेळ तुफान लोकप्रिय आहे. तिथंही अगदी झोपडपट्टीतून येऊन मोठा खेळाडू झालेल्या अनेक कहाण्या आहेत. 
नागपूर शहरातल्या गद्दी गोदाम या झोपडपट्टीतून ही कथा सुरू होते. कथेतील महत्त्वाची पात्रं ही अगदी कोवळी, तरुण मुलं आहेत. ती फाटकी आहेत. अतिशय गरिबीत राहतात. चोऱ्यामाऱ्या करतात. मारामाऱ्या करतात. नशापाणी करतात. थोडक्यात, ‘गंदी नाली के क़ीडे’ असं कुणीही म्हणावं असंच त्यांचं आयुष्य आहे. या मुलांच्या आयुष्यात योगायोगानं विजय बोराडे सर (अमिताभ) येतात आणि त्यांचं आयुष्य बदलतं. नागराज अगदी तब्येतीत, सावकाशीनं हा सगळा संघर्षाचा प्रवास रेखाटतो. एखादी ठाय लयीतली शास्त्रीय बंदिश चालावी, तसं हे चित्रण येतं. त्यामुळं सिनेमाचा कालावधीही तब्बल तीन तासांचा आहे. मात्र, अगदी मोजके क्षण वगळले तर तो कुठेही कंटाळवाणा होत नाही, हे दिग्दर्शकाचं यश आहे. मला वैयक्तिकरीत्या मात्र तो अजून किमान अर्ध्या तासानं कमी करता आला असता, असं वाटलं.

या सिनेमात पहिल्या प्रसंगापासूनच या संघर्षाची बीजं दिग्दर्शक रोवतो. एकेका व्यक्तिरेखेला सावकाश प्रस्थापित करतो. यातली एक मुस्लिम तरुणी तिला सतत त्रास देणाऱ्या पतीला सोडून, आपल्या तीन मुलींना घेऊन घराबाहेर निघते आणि ‘तू क्या मुझे तलाक देगा? मै ही तुझे तलाक देती हूँ’ असं म्हणून तीनदा ‘तलाक’ म्हणते आणि तिथून निघून जाते इथूनच या बंडखोर कथेला प्रारंभ होतो. या झोपडपट्टीतली मुलं, त्यांची अतिशय शिवराळ भाषा, भडक कपडे, रंगीबेरंगी केस यांसकट त्यांचं सगळं कठीण जगणं दिग्दर्शक आरसा धरल्यासारखा दाखवीत राहतो. हे सगळं आपण आपल्या आजूबाजूला नक्कीच पाहिलेलं असतं. अनेकदा आपण अशा वस्तीतून गेलेलोही असतो. मात्र, तिथं थांबून तिथल्या माणसांकडं नीट बघणं आपल्याला कधी जमलेलं नसतं, तर त्यांच्याशी बोलणं किंवा त्यांच्याशी मैत्री ही तर फार दूरची गोष्ट. बोराडे सर नेमकं हेच करतात. एका प्रसंगामुळं त्यांचा या मुलांशी सामना होतो आणि त्यांची पावलं नकळत या झोपडपट्टीकडं वळतात. एका कॉलेजमध्ये फुटबॉल प्रशिक्षक असलेल्या बोराडे सरांना या मुलांच्या पायांत असलेलं फुटबॉलचं अद्भुत कसब दिसतं. सुरुवातीला ते चक्क पैसे देऊन या मुलांना फुटबॉल खेळायला लावतात. हळूहळू मुलांमध्ये आणि त्यांच्यात मैत्री होते. अखेर त्यांच्याच कॉलेजच्या टीमला ही टीम हरवते आणि तिथून त्यांच्या एका आगळ्यावेगळ्या प्रवासाला सुरुवात होते. या प्रवासाची कथा म्हणजे सिनेमाचा उत्तरार्ध आहे. मध्यंतरात येणारं डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं गाणं आणि अमिताभचं बाबासाहेबांसमोर नतमस्तक होणं हे फार सूचक आहे.
उत्तरार्धात कथेत आणखी पात्रं येतात. संघर्ष आणखी टोकदार होतो. झोपडपट्टीतल्या प्रमुख पात्रांसोबत आता आपलीही ‘ना‌‌ळ’ जुळलेली असते. त्यांच्या ‘सैराट’पणावर आपणही फिदा होऊ लागतो. त्यांच्या जगण्यातल्या संघर्षाला हळहळतो, त्यांच्या छोट्याशा विजयाला टाळ्या पिटतो. पात्रांमधली आणि आपल्यामधली भिंत हळूहळू कोसळू लागते. उत्तरार्धात दिग्दर्शकाचा उपरोध, उपहास आणखी बोचरा होतो. या देशात सामान्य माणसाची किंमत काय, तर त्याचं ओळखपत्र असलेला एक कागद. तोच जर नसेल तर त्या माणसाचं अस्तित्वही हा देश मानणार नाही, हे उघडंवाघडं सत्य दिग्दर्शक काही प्रसंगांतून समोर मांडतो. नागराजच्या सिनेमांमध्ये क्लायमॅक्सला महत्त्व आहे. या सिनेमात तो मुंबई विमानतळावरच्या प्रसंगात येतो. हा प्रसंगही उत्तम आणि पुरेसा सूचक आहे. मात्र, नागराजच्या आधीच्या सिनेमांसारखा तो सणसणीत आणि गोळीबंद नाही. पण या सिनेमाची ती कदाचित गरजही नाही. आपल्या प्रमुख पात्रांनी भिंत ओलांडण्याची प्रतीकात्मक कृती सिनेमाला दोन्ही अर्थानं ‘उच्च’ पातळीवर नेते.
या सिनेमात अमिताभ बच्चनचं असणं वेगवेगळ्या अर्थांनी महत्त्वाचं आहे. त्यात दिग्दर्शकाची काही वैयक्तिक भावना असणं हा भाग बाजूला ठेवला तरी अमिताभसारख्या पडद्याबाहेर ‘लार्जर दॅन लाइफ’, ‘महानायक’ अशी प्रतिमा असणाऱ्या मोठ्या अभिनेत्यानं यातली बोराडे सरांची भूमिका साकारणं खूपच प्रतीकात्मक ठरलं आहे. वास्तविक अमिताभचं वय त्या पात्राच्या वयापेक्षा नक्कीच अधिक असणार. मात्र, अमिताभच्या जागी अनिल कपूर किंवा जॅकी श्रॉफ किंवा अक्षयकुमार किंवा अजय देवगण अशा त्या पात्राच्या खऱ्या वयाच्या अभिनेत्याचा विचार केला तरी अमिताभचं तिथं असणं आणि प्रत्यक्षात सिनेमात त्याचं बोराडे सरांच्या रूपात दिसणं किती महत्त्वाचं आहे, हे लक्षात येईल. (त्यातल्या त्यात शाहरुख खाननं ही भूमिका उत्तम केली असती, असंही एकदा वाटून गेलं. पण ते असो.) अमिताभच्या इमेजमुळं आणि वयामुळंही त्या भूमिकेला आलेली एक गोड स्वीकारार्हता या सिनेमाच्या यशाचा मोठा घटक आहे, हे निश्चित!
बाकी इतर प्रमुख भूमिकांमध्ये किशोर कदम, छाया कदम हे नागराजचे आवडते कलाकार यात दिसतात. आमचे नाना, म्हणजे रामदास फुटाणे यांना छोट्याशा भूमिकेत अमिताभसोबत काम करताना बघणं सुखावह आहे. आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरूही आहेत. मात्र, त्यांना तुलनेत फार चांगल्या भूमिका मिळालेल्या नाहीत. ‘फँड्री’मधला जब्या, म्हणजेच सोमनाथ अवघडे हाही यात एका भूमिकेत दिसतो. सर्वांत कौतुक करायचं ते डॉन झालेल्या अंकुश गेडामचं. तो या सिनेमाचा सर्वार्थाने नायक आहे. अगदी पहिल्या दृश्यापासून हा मुलगा आपली नजर वेधून घेतो. प्रसंगी त्याचा रागही येतो. मात्र, सर्व सिनेमावर या डॉनची छाप आहे हे निर्विवाद. सायली पाटीलनं तिची भूमिका चोख केली आहे. तिच्यातला आणि डॉनमधला रोमँटिक ट्रॅक मस्त आहे. बाकी भूमिकांत राजिया सुहैल, अँजेल अँथनी, कार्तिक उइके, प्रियांशू ठाकूर, जसप्रीतसिंग रंधवा या सर्वच नव्या आणि ‘रॉ’ मुलांनी कमाल केली आहे. अजय-अतुलचे संगीत नेहमीप्रमाणेच ढंगदार. मात्र, सिद श्रीरामचे ‘बादल से दोस्ती’ या गाण्याव्यतिरिक्त बाकी गाणी माझ्या तरी लक्षात राहिली नाहीत. साकेत कानेटकर यांचे पार्श्वसंगीत आणि सुधाकर यंकटी रेड्डी याचं छायाचित्रण अव्वल दर्जाचं!
हा सिनेमा सर्वांनी नक्कीच पाहायला पाहिजे. आपल्या स्वत:च्या मनात असलेल्या अनेक भयांवर, न्यूनगंडांवर मात करण्यासाठी बघायला हवा. आपल्याच आजूबाजूला असलेलं उपेक्षितांचं जग नीट जाणून घेण्यासाठी बघायला हवा. आपल्यातल्या आणि त्यांच्यातल्या अंतराची जाण आणि भान येण्यासाठी बघायला हवा. मधली ती मोठी भिंत ओलांडण्यासाठी ते आवश्यक आहे.

...

जाता जाता - एक अगदी सूक्ष्म, पण मला खटकलेला मुद्दा. या सिनेमाच्या श्रेयनामावलीत नागराजनं त्याचं नाव ‘मंजुले’ असं का लिहिलं आहे? हिंदी सिनेमा आहे म्हणून? हिंदीने आता ‘‌‌ळ’ स्वीकारला आहे. आणि नसला स्वीकारला तरी नागराजनं त्याचं आडनाव बदलण्याचं काहीच कारण नाही. ‘आयडेंटिटी’साठी लढणारा, भांडणारा दिग्दर्शक म्हणून नागराजची ओळख आहे, त्या पार्श्वभूमीवर हा विरोधाभास गमतीशीर वाटला.

---



-----------------------------------------





4 comments:

  1. उत्तम लिहिलंय.

    शाहरुखने काम केलं असतं, तर तो सिनेमा ....आणि शाहरुखचा झाला असता...अमिताभचा नागराजने वापर केला तरीही त्याच्या भूमिकेची लांबी वाढवलेली नाही, त्याला send off speech सुद्धा दिलेले नाही, क्रेडिट मध्ये अनेकांमध्ये एक असा अमिताभ दिसतो

    ReplyDelete
    Replies
    1. प्रश्नच नाही. अमिताभ तो अमिताभच!

      Delete
  2. शनिवारी मी हा चित्रपट पाहिला ..खूप आवडला . तुमच परीक्षण एकदम पटलं ..खूप धन्यवाद ..खरोखर सर्वांनी पहावा असा हा चित्रपट आहे..अमिताभ वयाने मोठा असूनही बोराडे सरांच्या भूमीकेत चपखल वाटला ..गम्मत म्हणजे या सिनेमातही त्याचे नाव 'विजय'हे आपोआप आले आहे ..तुमच्या लेखाच शीर्षक तुमच्या परीक्षण व अवलोकनातील वेगळेपण दाखवत.. खूप अभिनंदन!👌👍💐

    ReplyDelete