26 Dec 2021

‘८३’च्या निमित्ताने....

ते फक्त क्रिकेट नव्हतं...
-----------------------------



काल शनिवारी ‘८३’ बघितला. भारताने १९८३ मध्ये कपिल देवच्या जिगरबाज नेतृत्वाखाली जिंकलेल्या पहिल्यावहिल्या वन डे वर्ल्ड कपच्या यशोगाथेची कहाणी सांगणारा हा कबीर खान दिग्दर्शित चित्रपट. तो बघताना अनेकदा डोळे पाणावले. हृदय उचंबळून आलं. देशप्रेमाच्या भावनेनं मन ओथंबून गेलं. सिनेमा संपला, तरी किती तरी वेळ हा प्रभाव टिकून राहिला. मग पुन:पुन्हा त्या अंतिम सामन्याची क्षणचित्रं यू-ट्यूबवर बघितली. परत परत तो अपार जल्लोष, ती उत्कट विजयी भावना मनात साठवून घेतली. 
मला हा सिनेमा एवढं भावण्याचं आणखी एक वैयक्तिक कारण आहे. ते म्हणजे, मी १९८३ मध्ये सात-आठ वर्षांचा होतो, तरी मला हा वर्ल्ड कप बिलकुलच आठवत नाही. मला १९८१ च्या घटना आठवतात. महंमद अझरुद्दीननं हैदराबादकडून रणजी स्पर्धेत १५१ धावा केल्याची बातमी पेपरमध्ये वाचल्याचं मला लख्ख आठवतं. मला १९८२ ची एशियाड स्पर्धा अंधुक अंधुक आठवते. १९८४ नंतरच्या तर सर्वच घटना नीट आठवतात. १९८३ चा वर्ल्ड कप मात्र अजिबात आठवत नाही. मी तेव्हा तिसरीत गेलो होतो. जूनमध्ये शाळा नुकतीच सुरू झाली असणार. तेव्हा या वर्ल्ड कपची चर्चा आजूबाजूला होत असणारच. पेपर तर मी रोज वाचायचो. टीव्ही फार नव्हते, पण आजोबांना रेडिओवर कॉमेंटरी ऐकायची सवय होती. हे सगळं असूनही माझ्या स्मरणाच्या हार्ड डिस्कमधून वर्ल्ड कपची फाइल कायमची उडालेली आहे. या गोष्टीची मला निरंतर खंत वाटत आलेली आहे. मला १९८७ चा वर्ल्ड कप व्यवस्थितच आठवतो. इतकंच काय, तर १९८५ चा ऑस्ट्रेलियात झालेला बेन्सन अँड हेजेस मिनी वर्ल्ड कप आणि त्यात फायनलमध्ये आपण पाकिस्तानला धूळ चारून मिळविलेलं अजिंक्यपद, शास्त्रीला मिळालेली ऑडी हे सगळं आठवतं. पण १९८३ मात्र... टोटल ब्लँक! त्यामुळं ‘८३’ या सिनेमानं मला माझ्या आयुष्यातून कायमचे हरवलेले ते क्षण पुन्हा जगण्याची संधी दिली. सिनेमात नाट्यरूपानं का होईना, ते सगळं पुन्हा पाहता आलं, ते वातावरण अनुभवता आलं आणि म्हणूनच हा सिनेमा मला एवढा भिडला. (याच कारणामुळं मला या सिनेमाचं परीक्षण लिहिता येणार नाही.)
कबीर खाननं ‘८३’ सिनेमा अगदी ‘दिल से’ तयार केला आहे, हे त्या सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये जाणवतं. खरं सांगायचं तर या सिनेमाचा ट्रेलर मी प्रथम पाहिला तेव्हा मला तो काही तितकासा भावला नव्हता. अगदी रणवीरसिंहही कपिल म्हणून पटला नव्हता. इतर खेळाडू तर सोडूनच द्या! मात्र, त्यामुळंच मी अगदी किमान अपेक्षा ठेवून हा सिनेमा पाहायला गेलो होतो. त्या तुलनेत तो खूपच उजवा निघाला आणि अंत:करणापर्यंत पोचला. 
हा सिनेमा अर्थातच केवळ वर्ल्ड कपमधल्या त्या विजयापुरता नाही. तो अर्थातच केवळ क्रिकेटपुरताही नाही. भारताला जागतिक स्तरावर एक ताकद म्हणून ओळख मिळवून देणारी, देशवासीयांचा स्वाभिमान जागविणारी, पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणारी अशी ती एक ऐतिहासिक घटना होती. म्हणूनच कबीर खाननं चित्रपटाच्या सुरुवातीलाच त्या काळात आजूबाजूला घडत असलेल्या घटनांचे सूचक उल्लेख करून आपल्याला त्या काळात नेलंय. फूलनदेवी आणि नवाबपूरची दंगल हे त्यातले ठळक उल्लेख. 
भारतीय क्रिकेट मंडळ आणि तेव्हाच्या क्रिकेटपटूंची एकूणच सांपत्तिक स्थिती, क्रिकेटच्या जगात, त्यातही वन डे क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं असलेलं स्थान, स्वातंत्र्य मिळून ३५ वर्षं झाली तरी इंग्लंडबाबत मनात असलेली ‘साहेबाचा देश’ ही मानसिकता, इंग्लिश क्रिकेट बोर्ड आणि एकूणच तेथील पत्रकार, सर्वसामान्य यांच्या मनात भारताबद्दल असलेली तुच्छतावादी मानसिकता, वेस्ट इंडिजच्या संघाचा तेव्हा असलेला प्रचंड दबदबा, आपले क्रिकेटपटू आणि त्यांचे कुटुंबीय, आपल्या संघाचे उत्साही आणि धडाकेबाज मॅनेजर मानसिंह असे सगळे बारकावे आणि व्यक्तिरेखा कबीर खाननं अगदी बारकाईनं टिपल्या आहेत. 

सिनेमाचा सगळा भर हा आपल्या संघाने इंग्लंडमध्ये पोचल्यापासून ते वर्ल्ड कप जिंकेपर्यंत खेळलेला प्रत्येक सामना आणि त्याच्या आगेमागे ड्रेसिंग रूममध्ये आणि मैदानावर घडत असलेल्या घटना यावरच केंद्रित आहे. त्यातही टनब्रिज वेल्सच्या मैदानावर कपिलने झिंबाब्वेविरुद्ध मारलेलं जबरदस्त शतक आणि १७५ धावा करून मोडलेला ग्लेन टर्नरचा विश्वविक्रम हा सर्वच घटनाक्रम अत्यंत प्रभावी झाला आहे. कपिल आणि सुनील यांच्यात असलेली काहीशी तेढ, श्रीकांतचा गमत्या स्वभाव, इंग्लंडच्या राणीला भेटण्याचा प्रसंग, श्रीकांत व कपिलला एका साउथ इंडियन कुटुंबाकडून भोजनाचं आलेलं आमंत्रण व त्यांच्या घरातील प्रसंग, नंतर ब्रिटिश राजदूतांच्या पार्टीतील श्रीकांतचं जोरदार भाषण, संदीप व रवी शास्त्री यांना आणि तीन-चार जणांसह रात्री मजा करायला बाहेर जायचं असतं तेव्हा कपिल त्यांना सल्ला देतो तो प्रसंग, गावसकरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून वगळण्याचा प्रसंग, वेंगसरकरचा जबडा मोडून तो वर्ल्ड कपला मुकण्याचा प्रसंग, इंग्लंडला हरवल्यानंतर भारतीय चाहत्यांना ढोल वाजवू न देणाऱ्या त्यांच्या उद्धट प्रेक्षकांना भारतीय प्रेक्षकांनी ठोकणं अशा अनेक घटनांच्या साखळीतून वर्ल्ड कपच्या मोहिमेचा हा थरार आपल्यासमोर उलगडत जातो.
भारतीय संघाला या स्पर्धेला जाण्यापूर्वी कुणीही फार मोजत नव्हतं, हे आता सर्वश्रुत आहे. या सिनेमातही ठायी ठायी त्याचा प्रत्यय देणारे प्रसंग आहेत. भारतीय संघाला लॉर्ड्सचे पासच दिलेले नसतात. मॅनेजर मानसिंह हे पासेस मागायला जातात, तेव्हा उद्धट इंग्रज अधिकारी ‘भारताची एकही मॅच लॉर्ड्सला नाही, तुमचा संघ फायनलला गेला तर नक्की पास देऊ’ असं सांगतो. त्यानंतरच्या प्रसंगात मानसिंह त्याच अधिकाऱ्याकडे पुन्हा जातात तेव्हा थिएटरमध्ये एकच जल्लोष होतो, हे सांगणे न लगे. इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय पाठीराख्यांचाही एक समांतर ट्रॅक या सिनेमात आहे. त्यातही एक लहान मुलगा आणि त्याचे वडील हे जणू काही समस्त भारतीय प्रेक्षकांचे प्रतिनिधी म्हणून सिनेमाभर दिसत राहतात. या मुलाच्या हातातील तिरंग्यामुळंच कपिल आणि त्याच्या संघाला प्रेरणा मिळते. 
कपिलला व्यवस्थित इंग्लिश बोलता येत नसतं. या मुद्द्याचाही सिनेमात अनेकदा उल्लेख येतो. त्या अनुषंगाने कपिलची पहिली प्रेस कॉन्फरन्स आणि तिथं असलेले दोन-तीन पत्रकार आणि फायनलपूर्वीची भरगच्च प्रेस कॉन्फरन्स आणि तिथंही पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्या आत्मविश्वासानं ‘वी आर हिअर टु विन’ असं कपिल म्हणतो, त्याच आत्मविश्वासानं हेच वाक्य ऐकवणारा कपिल बघताना डोळे भरून न आले तरच नवल. 
भारतीय संघाच्या बसमध्ये मानसिंह कपिलला ‘टीम मीटिंग’ घ्यायला सांगतात, तो प्रसंगही असाच जमून आलाय. त्या बसमध्ये रंगीत टीव्ही असतो आणि व्हीसीआरवर लागलेलं ‘हम बन तुम बने एक दुजे के लिए’ हे गाणं आणि त्या गाण्यातील ‘आय डोण्ट नो व्हॉट यू से’ या ओळींचा विनोदासाठी केलेला चपखल वापर यासाठी दिग्दर्शकाला आपली दाद जातेच. तसंच बहुतेक सामन्यांची प्रत्यक्ष दृश्यं आणि त्यात खऱ्या सामन्यातला एखादा फोटो आणि टीव्हीवर दिसणारा सामन्यात मूळ सामन्याचीच ध्वनिफीत वापरणं अशा काही युक्त्यांनी मजा येते.
भारतीय संघ या वर्ल्ड कपपूर्वी आधीच्या दोन वर्ल्ड कपमध्ये केवळ एक सामना जिंकू शकला होता. तोही ईस्ट आफ्रिकेविरुद्ध. मात्र, १९८३ च्या वर्ल्ड कपनं भारतीय क्रिकेट आरपार बदलून गेलं. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्र्यांचा एक प्रसंग सिनेमात आहे. नवाबपूरच्या दंगली थांबविण्यासाठी पंतप्रधानांनी क्रिकेटज्वराचा उपयोग करून घेतला, असं त्यात सूचित करण्यात आलंय. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोचल्यानंतरच खऱ्या अर्थानं भारतात माध्यमांनी (म्हणजे वृत्तपत्रंच!) या स्पर्धेचं जोरदार वार्तांकन सुरू केलं आणि सर्वसामान्य जनतेतही स्पर्धेची चर्चा सुरू झाली. मग होस्टेलवर वर्गणी काढून टीव्ही आणले गेले. गावोगावी अँटिने बसविले गेले. ‘पिक्चर दिसतंय का?’ हा अँटेना हलवून विचारायचा प्रश्न सर्व देशभरात विचारला जाऊ लागला. सिनेमात हे सगळं क्रिकेटचं वाढतं प्रेम चढत्या भाजणीनं दाखवण्यात आलंय. भारतानं पहिला सामना वेस्ट इंडिजविरुद्ध जिंकला, तरी ‘भारत नशिबानं जिंकला’ असं लिहिणाऱ्या इंग्लिश वृत्तपत्रांच्या पानांनी कपिल बूट साफ करत बसतो, हे दृश्य फारच बोलकं! (भारत जिंकला तर I will eat my words म्हणणारा समीक्षक भारतानं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर शेवटी महिन्यानंतर चक्क त्यानं लिहिलेला लेख पाण्यात (की दारूत?) बुडवून खातो, याचाही उल्लेख सिनेमाच्या शेवटी येतो.) थोडक्यात, सर्वांच्या नाकावर टिच्चून भारतानं, विशेषत: कपिलनं आपल्या जिगरी वृत्तीच्या बळावर हा वर्ल्ड कप खेचून आणला होता. या मूळ घटनेतच इतकं नाट्य आहे, की त्यावर गेली ३८ वर्षं चित्रपट तयार कसा झाला नाही, याचंच आश्चर्य वाटतं. करोनापूर्व काळातच तयार झालेला हा सिनेमा प्रदर्शित व्हायला अखेर जवळपास दोन वर्षं जावी लागली. मात्र, हा सिनेमा बघण्याची मज्जा मोठ्या पडद्यावरच, यात काही वाद नाही.

अखेर कलाकारांविषयी. रणवीरसिंह कपिल म्हणून शोभत नाही, हे ट्रेलर बघून झालेलं माझं मत सिनेमा बघितल्यानंतर पूर्ण पुसलं गेलं. त्यानं फारच मेहनतीनं ही भूमिका साकारली आहे, यात वाद नाही. श्रीकांत झालेला जिवा हा अभिनेता मजा आणतो. पंकज त्रिपाठीनं मानसिंहच्या भूमिकेत हा सिनेमा अक्षरश: तोलून धरला आहे. आदिनाथ कोठारेला दिलीप वेंगसरकरांची छोटीशी भूमिका करण्याची संधी मिळाली आहे. सुनील गावसकर झालेला ताहिर भसीन मुळीच गावसकर वाटत नाही. पण त्यानं काम चांगलं केलंय. बाकी बलविंदर संधूचं काम करणाऱ्या कलाकारानं (बहुतेक अॅमी विर्क असं नाव आहे) पण लक्षात राहण्यासारखं काम केलंय. नीना गुप्तानं कपिलच्या आईचं काम सुंदर केलंय. इतर संघांचे खेळाडू (जसेच्या तसे दिसणारे) मिळणं अवघडच. त्यातल्या त्यात व्हिव रिचर्ड्सला जरा वाव आहे. तो कलाकारही बराचसा रिचर्ड्ससारखा दिसणारा निवडला आहे. दीपिका पदुकोणनं कपिलच्या पत्नीची - रोमीची छोटी भूमिका साकारली आहे. अंतिम सामन्यापूर्वी सकाळी लॉर्डसवरचा सूर्योदय पाहत तिचं आणि कपिलचं संभाषण हा या सिनेमाचा एक हायपॉइंट आहे. त्याच सकाळी लॉर्ड्सवर तिरंगा वर वर जातानाचं दृश्य पाहताना डोळे वाहिल्याशिवाय राहत नाहीत. चित्रपटातली दोन-तीन गाणीही स्फूर्तिदायी आहेत. 
भारतामधल्या क्रिकेटचं भवितव्य कायमचं बदलवून टाकणारी या स्फूर्तिदायी यशोगाथा पाहायला हवीच. क्रिकेट न आवडणाऱ्यांनीही जरूर पाहावा, तसंच आपल्या लहान मुलांना आवर्जून दाखवावा असाच हा चित्रपट आहे.

---

याच शीर्षकाचा माझा आणखी एक लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

19 Dec 2021

पुणे मेट्रो लेख

मेट्रोच्या बोगद्यात...
-----------------------

जगातल्या सर्व गोष्टींविषयी मला कुतूहल वाटतं. माझ्या पेशाला पूरक अशीच ही गोष्ट आहे. आपल्या आजूबाजूला काय चाललंय ते जाणून घ्यावं, असं सतत वाटत असतं. नवीन काही निर्माण झालं, की शक्य होईल तेवढ्या लवकर त्या ठिकाणाला भेट देणं मला आवडतं.
पुणे मेट्रोचं काम सुरू झाल्यापासून मला त्या कामाविषयी कुतूहल आहे. मी येता-जाता त्या कामाची प्रगती बघत असतो. स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट हा पिंपरी ते स्वारगेट या लाइनचा भाग अंडरग्राउंड आहे. हे काम बघण्याचा योग शनिवारी आला. सहकारी सुनीत भावे पूर्वीपासून मेट्रोशी संबंधित सर्व बातम्या बघतो. त्याच्यामुळं ऑफिसातल्या काही सहकाऱ्यांना मेट्रोचं काम बघता आलं. पूर्वीही काही जण गेले होते, तेव्हा मला जमलं नव्हतं. मात्र, या शनिवारी जमवलंच. मग अभिजित थिटे, चैत्राली चांदोरकर, विहंग घाटे आणि मी असे आम्ही चौघं हे काम बघायला दुपारी बारा वाजता स्वारगेटला पोचलो. स्वारगेटकडून सारसबागेकडं येताना पाणीपुरवठा केंद्राच्या अलीकडं मेट्रोचं मोठं गेट लागतं. तिथून आत गेल्यावर तिथल्या जनसंपर्क अधिकारी अर्चना यांनी आमचं स्वागत केलं.

प्रत्येकाला शूज कम्पलसरी होते. याशिवाय तिथं गेल्यावर हेल्मेट आणि रेडियमचं जॅकेट आम्हाला घालायला दिलं. बोगद्यापर्यंत खाली जायला एखादी लिफ्ट असेल असं वाटलं होतं. प्रत्यक्षात लोखंडी सांगाड्याचा एक तात्पुरता जिना तिथं उभारला आहे. या जिन्यात एका वेळी पाचच लोकांना खाली किंवा वर जाता येतं. आम्ही तो जिना उतरू लागलो, तेव्हा तिथले काही कामगार वर येताना दिसले. दोन माणसं जेमतेम जाऊ शकतील, अशा रुंदीच्या त्या जिन्यानं आम्ही खाली खाली जात होतो. जवळपास तीस मीटर म्हणजे दहा मजले एवढं खाली आम्ही गेलो. वरून पाहिलं तर खाली एवढं काम सुरू आहे हे समजतही नाही. आम्ही खाली पोचल्यावरच त्या कामाच्या भव्यतेचा अंदाज आला. डाव्या बाजूला मेट्रोच्या स्टेशनची इमारत आकार घेत होती. तिथं एकूण चार मजले दिसत होते. आम्हाला तिकडं न जाता उजवीकडं म्हणजे बोगद्याकडं जायचं होतं. तिथं सुरुवातीला एक केबिन होती. तिथल्या रजिस्टरमध्ये आम्ही आमची नावं व येण्याची वेळ नोंदविली. अर्चना यांनी आम्हाला प्राथमिक माहिती दिली व नंतर युवराज गावंडे हे तेथील काम पाहणारे इंजिनीअर आमच्यासोबत आले. त्यांनीच आम्हाला नंतर सगळी माहिती दिली. बोगद्याच्या सुरुवातीची जागा खूपच मोठी होती. मधोमध दोन ठिकाणी रुळ टाकले होते. त्यावरून ट्रॉलीची ये-जा सुरू होती. बोगद्याच्या आत बसवायच्या सिमेंट-काँक्रिट रिंग वाहून नेण्याचं आणि टीबीएमनं बोगदा खणल्यावर निघालेली माती आणून टाकायचं काम या ट्रॉल्या करीत होत्या. स्वारगेट हे शेवटचं स्टेशन असल्यानं इथं रुळ बरेच क्रिस-क्रॉस होणार आहेत. त्यामुळं हा सुरुवातीचा भाग बराच रुंद होता. इथून दोन वेगवेगळ्या बोगद्यांतून मेट्रो सिव्हिल कोर्टाकडे (म्हणजेच मंडई, बुधवार चौकाकडे) जाणार आहे आणि तिथून येणार आहे. स्वारगेटवरून मंडईकडे जाणाऱ्या लाइनला डाउन लाइन म्हणतात, तर तिकडून इकडे येणाऱ्या लाइनला अप लाइन म्हणतात. अप लाइनच्या बोगद्याचं खोदकाम जवळपास एक किलोमीटरहून अधिक झालं आहे.
(मंडईपर्यंतचं अंतर साधारण दोन किलोमीटर २०० मीटर एवढं आहे.) सिव्हिल कोर्टकडून खणत येणारं टीबीएम आणि इकडून तिकडं खणत जाणारं टीबीएम यांचं जंक्शन बुधवार चौक (फडके हौद स्टेशन) इथं आहे. अप लाइनचं मशिन एक किलोमीटरहून दूर असल्यानं युवराज यांनी आम्हाला डाउन लाइनवरचं मशिन दाखवायला न्यायचं ठरवलं. हे मशिन साधारण पाचशे मीटरपर्यंत दूर खणत गेलं होतं. आम्ही त्या बोगद्यात शिरलो. तो बोगदा अगदी व्यवस्थित तयार झालाय. शेजारून (त्या जिन्यासारखीच) एक तात्पुरती लोखंडी पट्ट्यांची लाइन चालत जाणाऱ्यांसाठी केली आहे. आम्ही त्या पट्टीवरून चालत निघालो. थोडं आत गेल्यावर जरा घाम जाणवू लागला. आम्ही खरं तर फार खोल आलो नव्हतो, तरी बोगद्यात आत आत चाललो आहोत या जाणिवेनं थोडीशी भीती वाटली. अर्थात तिथं सर्व सुरक्षा व्यवस्था (पुरेसे दिवे, ऑक्सिजन इ.) चोख होती आणि महत्त्वाचं म्हणजे टीबीएम बघायची उत्सुकता फार होती. आत आत जाऊ लागलो तशी थोडी धाप लागू लागली. (ज्यांना श्वासांचा किंवा दम्याचा वगैरे त्रास आहे, त्यांना इथं येणं जरा अवघडच जाईल.) आम्ही आमचे स्वेटर, जर्किन काढून टाकली. त्यांचं ते हेल्मेट वर होतंच. शिवाय मास्क. त्यामुळं नंतर मास्कही काढून टाकला. आता जरा नीट श्वास घेऊन चालता यायला लागलं.
अखेर (आमच्या दृष्टीनं) बरीच पायपीट केल्यावर यंत्राचा आवाज येऊ लागला. लाइट दिसू लागले. सुरुवातीला रेल्वेच्या इंजिनासारखं एक युनिट लागलं. तिथं आत अनेक कम्प्युटर आणि डिस्प्ले होते. समोर चाललेलं सगळं काम आणि त्याचे तपशील तिथं दिसत होते. सीसीटीव्ही कॅमेरे होते. या केबिनमध्ये एसी होता. त्यामुळं तिथं शिरताच एकदम बरं वाटलं. हे विचार, ते विचार असं करून थोडा जास्तच वेळ आम्ही तिथं उभे राहिलो आणि जरा गार झालो. (बाकी हे सगळं अवाढव्य काम बघून तसेही गारच झालो होतो म्हणा...) हे टीबीएम ‘टेराटेक’ नावाच्या ऑस्ट्रेलियन कंपनीचं असलं, तरी ते चीनमध्ये तयार झालं आहे. त्या इंजिनासारख्या दिसणाऱ्या युनिटमधून एक ट्रॉली मागे जाताना दिसली. खणल्यावर बाहेर पडणारा सगळा राडारोडा वरून सिमेंट मिक्सरसारख्या मोठ्या भांड्यातून खाली एकेका ट्रॉलीत पडत होता. नंतर ही ट्रॉली त्याच रुळांवरून मागे जात बोगद्यातून बाहेर जात होती. हा सगळा टीबीएमचाच भाग होता असं कळलं. मला ते यंत्र म्हणजे एकच युनिट असेल असं वाटत होतं. पण ते समोर गोल फिरणारं कटर हा त्या महाकाय यंत्राचा केवळ एक भाग होता, असं कळलं. त्या कटरपर्यंत तर आपल्या पोचताच येत नाही. त्याच्यामागे सिमेंटच्या रिंग गोलाकार बसवण्याचं काम यंत्राच्या साह्यानं सुरू होतं. हे कामही ऑटोमॅटिक होतं. फक्त दोन रिंग जोडणारे मोठाले स्क्रू यंत्रानं पिळण्याचं काम कर्मचारी करतात. अशी एकेक रिंग बसवत हे मशिन पुढं जातं. दिवसाला साधारण आठ ते दहा मीटर खोदाई करून रिंग बसवल्या जातात. आम्ही गेलो तेव्हा ५५३ वी रिंग बसविली जात होती. (म्हणजेच साधारण ५०० ते ५५० मीटर अंतर मशिननं पार केलं होतं.) आपण आत्ता साधारण कुठे आहोत, असं अभिजितनं विचारलं. तेव्हा साधारण खडक पोलिस स्टेशनच्या आसपास (म्हणजे त्या जागेच्या खाली) आपण आहोत, असं समजलं. गंमत वाटली. आपल्या डोक्यावर आख्खं शहर, रस्ते, तुफान रहदारी आहे, या कल्पनेनं थरारून जायला झालं. इथं २४ बाय ७ सतत काम सुरू असतं, असं युवराज सांगत होते. आठ आठ तासांची शिफ्ट असते. तरीही हे कर्मचारी तिथं एवढ्या उकाड्यात आणि थोड्या कमी ऑक्सिजनमध्ये काम करताहेत हे बघून कमालच वाटली. हे काम साधारणपणे सहा महिन्यांत, तर शेजारच्या अप लाइनचं काम पुढील तीन महिन्यांत पूर्ण करण्याचं ‘महामेट्रो’चं नियोजन आहे. 

सगळं काम बघितलं, फोटो काढले आणि मागं फिरलो. परत येताना बोगद्याच्या बाहेरचा प्रकाश दिसला आणि हायसं वाटलं. तिथं प्रचंडच पाणी गळत होतं. पुण्यात भूजलपातळी अगदी चांगली आहे. जरा खणलं, की पाणी लागतंच. इथं तर शेजारून कालवाही जातो. हे पाणी नंतर वॉटरप्रूफिंग तंत्रानं बंद करणार आहेत. बाहेर पडताना पुन्हा एकदा वेळ नोंदविली आणि तिथून निघालो. अगदी दारात एक छोटंसं मंदिर असल्याचं दिसलं. हे आत जाताना मगाशी दिसलं नव्हतं. तिथंही फोटो काढले. आता पुन्हा त्या तात्पुरत्या जिन्याने दहा मजले वर जायचं होतं. शेजारी चार मजली स्टेशन आकाराला येत होतं. जिने चढून वर आलो, तेव्हा ऊन चांगलंच जाणवत होतं. तो सगळा एरिया केवढा मोठा आहे, याचा आता नीट अंदाज आला. स्वारगेट हे मल्टिमोडल हब असणार आहे. इथं पीएमपी, एसटी आणि मेट्रो यांना एकाच छताखाली आणण्यात येणार आहे.
बाहेर पडलो. वरच्या बाजूला त्यांचं छोटंसं ऑफिस आहे. तिथं गेलो. चहा झाला. समोर मेट्रोचे नकाशे लावले होते. साइड व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, एलिव्हेशन बघून इंजिनीअरिंगचे दिवस आठवले. समोर एका नकाशावर सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांचा फोटो होता. ते माझ्याकडंच बघताहेत असा भास झाला आणि मी मनोमन चेहरा झाकूनच घेतला.
त्या सग‌ळ्या जगड्व्याळ पसाऱ्याला आणि हे काम उभं करणाऱ्या सर्व कर्मचारी, अधिकारी आणि अभियंत्यांना नमस्कार केला आणि तिथून निघालो...


---

याआधी मेट्रोवर लिहिलेला लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा...

---