9 Feb 2023

वर्धा डायरी - उत्तरार्ध

‘पागल दौड’ विसरताना...
------------------------------



दुसऱ्या दिवशी अभिजित व मी लवकर उठलो. खाली जाऊन चहा घेणं गरजेचं होतं. हॉटेलच्या जवळच एक ‘आरंभ अमृततुल्य’ आणि एक ‘परमात्मा वडापाव सेंटर’ दिसलं. पुण्याबाहेर पूर्वी ‘अमृततुल्य’ दिसत नसे. सोशल मीडियाच्या या काळात सगळीकडं सांस्कृतिक सपाटीकरण झालं आहे. त्या दुकानातल्या पाट्या थेट पुणेरी होत्या. ‘परमात्मा वडापाव सेंटर’मध्ये तर्री पोहेही मिळत होते. अभिजितला भूक लागली होती. त्यामुळं एक प्लेट पोहे घेऊन ताव मारला. जरा वेळानं आवरून तिघंही पुन्हा ‘ऑटो’ करून संमेलनस्थळी पोचलो. (शंभर रुपये झाले हे आता सांगायला नको!) आज सकाळी मुख्य मंडपात डॉ. अभय बंग यांची मुलाखत होती. संपूर्ण संमेलनातलं माझ्यासाठी तरी हे एक प्रमुख आकर्षण होतं. आम्ही नाश्त्यासाठी भोजन कक्षात पोचलो, तेव्हा यशो (यशोदा वाकणकर) आणि मुक्ता (पुणतांबेकर) दोघीही तिथंच होत्या. विवेक सावंत आणि विनोद शिरसाठही होते. सावंत, शिरसाठ आणि मुक्ता हे तिघं अभय बंगांची मुलाखत घेणार होते. मुलाखतीची अधिकृत वेळ सकाळी ९.३० असली, तरी ती इथल्या शिरस्त्याप्रमाणे उशिरा सुरू होणार, हे आता जवळपास सगळ्यांनी गृहीत धरलं होतं. त्यातही तिघेही मुलाखतकर्ते आमच्यासोबतच असल्यामुळं आम्ही निवांत ब्रेकफास्ट केला. 
ब्रेकफास्टनंतर मुख्य मंडपात येऊन बसलो. मुलाखत साधारण साडेदहा वाजता सुरू झाली. शिरसाठ, मुक्ता व सावंत यांनी नेमके प्रश्न विचारले. त्यांची तयारी जाणवत होती. (नंतर आम्ही मुक्ताशी बोललो, तेव्हा तिनं या मुलाखतीसाठी किती आणि कशी तयारी केली होती, हे तपशीलवार सांगितलं.) आम्ही डॉ. बंग यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक होतो. त्यांनी अजिबात निराश केलं नाही. मी डॉ. बंग यांचं नाव प्रथम ऐकलं ते अनिल अवचट यांनी त्यांच्यावर ‘साप्ताहिक सकाळ’च्या (बहुतेक १९९४) दिवाळी अंकात लिहिलेला ‘शोध आरोग्याचा’ हा तपशीलवार लेख वाचला तेव्हा! त्यानंतर २००२ मध्ये मी व संतोष (देशपांडे) आम्ही दोघं गडचिरोलीला डॉ. बंग यांच्या ‘सर्च’ प्रकल्पात आणि पुढं हेमलकसाला डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पात दोन-दोन दिवस राहूनही आलो होतो. डॉ. बंग आणि राणी बंग यांच्याशी गप्पा मारून, त्यांच्यासोबत सकाळी फिरायला जाऊन आम्ही तेव्हा फारच खूश झालो होतो. त्यानंतर बंग यांच्याशी थेट संपर्क काही राहिला नाही. अगदी अलीकडं, म्हणजे २०१९ च्या जानेवारी लोणावळ्यात मनशक्ती केंद्रात शिक्षण परिषद भरली होती, तेव्हा वर्षाच्या (तोडमल) आग्रहास्तव मी खास लोणावळ्याला गेलो होतो, याचं एक प्रमुख कारण म्हणजे तिथं डॉ. अभय बंग येणार होते. तिथं त्यांच्याशी निवांत गप्पा झाल्या. त्यानंतर आता संमेलनात त्यांचे विचार ऐकत होतो. डॉ. बंग शांतपणे, पण ठामपणे आपले विचार मांडत होते. वर्धा परिसरातच त्यांचे वडील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ठाकूरदास बंग यांचं मोठं काम होतं. ते महात्मा गांधी आणि विनोबांच्या नित्य सहवासात होते. त्या प्रभावापासून ते गडचिरोलीत उभारलेल्या ‘सर्च’च्या कामाबद्दल, दारूमुक्तीच्या आंदोलनाबद्दल, विनोबांवर झालेल्या अन्यायाबद्दल ते तपशीलवार बोलले. ‘ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा हे तिघे मराठीतील सार्वकालिक श्रेष्ठ साहित्यिक आहेत,’ असं त्यांनी आवर्जून सांगितलं. बंग यांच्या विचारांतील ठामपणा, स्पष्टपणा त्यांच्या संयमित प्रतिपादनात सहज जाणवत होता. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीतील अनुभव, त्यांतून आलेलं शहाणपण आणि सहज-साध्या संवादातून मोठा विचार मांडण्याची हातोटी यामुळं ही मुलाखत अगदी संस्मरणीय ठरली. 
मुलाखत संपल्यावर मी व यशो थेट व्यासपीठावर गेलो डॉक्टरांना भेटायला... तिथं अर्थात त्यांच्याभोवती गर्दी होती. त्यात वर्ध्यातली स्थानिक मंडळी तर जवळपास सगळीच त्यांच्या ओळखीची! तरीही मी त्यांना भेटून मुलाखत छान झाल्याचं सांगितलं. व्यासपीठावरून खाली उतरलो तर रेणुका देशकर भेटल्या. त्या आणि मुक्ता मैत्रिणी हे समजलं. देशकर यांच्यासोबत फोटो काढले. मंदार तर त्यांच्या आवाजाचा फॅनच झाला होता. नंतर ग्रंथ प्रदर्शनात गेलो. शासकीय मुद्रणालयाच्या स्टॉलवर ‘इथं डिजिटल पेमेंट चालणार नाही; फक्त रोख’ असा बोर्ड लावलेला दिसला. मला ते जरा विचित्र वाटलं. मग त्या बोर्डचा फोटो काढला. नंतर ‘मनोविकास’च्या स्टॉलवर गेलो. तिथं आशिष पाटकर भेटले. माझं ‘सुपरहिरो’ सीरीजमधलं धोनीवरचं पुस्तक तिथं दिसलं नाही. त्याच्या प्रती संपल्याचं कळलं. नंतर शेजारीच ‘मनशक्ती’चा स्टॉल होता. तिथं दीपक अलूरकर आणि सुहास गुधाटे हे दोघं भेटले. तिथंही फोटोसेशन पार पडलं. मग संपूर्ण ग्रंथप्रदर्शनाला एक चक्कर मारली. ऊन बऱ्यापैकी जाणवत होतं. भूकही लागली होती. जेवण झाल्यावर आता आम्हाला सेवाग्रामला जायचं होतं. साधारण आठ किलोमीटर अंतरावर ‘सेवाग्राम’ आहे. तिथं जायला ‘ऑटो’वाल्यानं २०० रुपये सांगितले. आम्ही लगेच निघालो. अर्ध्या तासात तिथं पोचलो. ‘बापू कुटी’च्या समोरच त्यानं आम्हाला सोडलं. ‘सेवाग्राम’विषयी माझी जी कल्पना होती, त्यापेक्षा ही जागा, परिसर थोडा वेगळा निघाला. आत शिरल्यावर तिथल्या दाट झाडांची सावली आणि समोर दिसत असलेल्या झोपड्या यामुळं आपोआप वेगळं वातावरण जाणवू लागलं. मी यापूर्वी दिल्लीत ‘राजघाट’ला दोन-तीनदा गेलो आहे. इथं सेवाग्रामला प्रथमच येत होतो. महात्मा गांधी इथं १९३६ ते १९४६ या काळात राहिले. (तेही सलग नाहीच.) इथं आदिनिवास (सर्वांत आधी बांधलेली एक झोपडी), मग बा कुटी, मग बापू कुटी, महादेव देसाई कुटी, परचुरे शास्त्री कुटी अशा वेगवेगळ्या झोपड्या आहेत. या झोपड्या असल्या, तरी पक्क्या बांधकामाच्या आणि कौलारू आहेत. पहिली झोपडी बांधताना तिचा खर्च शंभर रुपयांपेक्षा अधिक व्हायला नको, अशी बापूजींची अट होती म्हणे. तरीही तिथं बाथटब, कमोड आदी सुविधा तेव्हाच्या काळात होत्या. यात एक टिनचा बाथटब उभा करून ठेवलेला होता, तो जास्तकरून बापूजी वापरायचे. दुसरा एक संगमरवरी बाथटब होता, ते घनश्यामदास बिर्लांनी पाठवला होता. तो लुई फिशर (गांधीजींचे चरित्रकार) वापरत असत, असं तिथं लिहिलं होतं. तिथं एक आधुनिक पद्धतीचा कमोडही होता. बापूजी तो अर्थात स्वत: स्वच्छ करत. तिथला वेळ वाया न घालवता, ते कागदपत्रं बघत. त्यासाठीची एक छोटी रॅक तिथं शेजारीच ठेवण्यात आली होती. या झोपडीची जागा कमी पडू लागली आणि तिथं इतर पुरुषांचा वावर वाढू लागला, तसं जमनालाल बजाज यांनी कस्तुरबांसाठी दुसरी झोपडी उभारण्याची इच्छा व्यक्त केली. बापूंनी नाइलाजाने ती मान्य केली. त्यानंतर स्वत: बापूजींसाठी आणखी एक कुटी उभारण्यात आली. तीत त्यांच्या दैनंदिन वापरातल्या सर्व वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. बापूजींशी संपर्क साधणं शक्य व्हावं म्हणून तत्कालीन गव्हर्नर लिनलिथगो यानं तिथं एक हॉटलाइन बसवली होती. तो फोनबूथही बापूंच्या कार्यालयात होता. याशिवाय त्या परिसरात नित्य साप आढळत. ते बंदिस्त करून ठेवण्याची मोठी पेटी आणि साप पकडण्याचा मोठा लाकडी चिमटाही तिथं होता. (आत फोटोग्राफीला परवानगी नसल्यानं या वस्तूंचे फोटो काढता आले नाहीत.) शेवटच्या काही दिवसांत आजारी असताना बापूजी (आयसोलेशनमध्ये) दुसऱ्याच एका कुटीत राहिले होते. तिच्याबाहेर ‘पागल दौड’ या शीर्षकाखाली बापूजींचे विचार लिहिलेली पाटी लावली आहे. माणूस भौतिक सुखांमागे पळतो आहे आणि खऱ्या सुखांकडे त्याचे दुर्लक्ष होते आहे, अशा आशयाचे ते विचार अगदी आजही सयुक्तिक वाटतात. 

त्या सर्व कुटींच्या आत फोटो काढायला परवानगी नसली, तरी बाहेर फोटो काढता येत होते. आम्ही तिथं फोटो काढले. व्हिडिओही केले. जरा वेळ तिथल्या डेरेदार झाडांच्या सावलीत बसलो. ही झाडं बापूजी हयात असतानाही इथं होती, या विचारानं अंगावर काटा येत होता. त्या वातावरणातल्या लहरी फार पवित्र, शांतवणाऱ्या, स्नेहशील होत्या. ‘महात्मा गांधी नामक एक महामानव या भूतलावर होऊन गेला, यावर पुढच्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत,’ असं अल्बर्ट आइन्स्टाइन गांधीजींच्या मृत्यूनंतर म्हणाले होते. सेवाग्रामच्या त्या परिसरात असताना मात्र वाटलं, त्यांचा हा सर्व इतिहास असा जतन करून ठेवला आहे, की त्या महात्म्याची आठवण तुम्हाला हरघडी व्हावी. सेवाग्राममध्ये अनेक सहली येत होत्या. मुलं चपला-बूट बाहेर काढून बापूंच्या त्या पवित्र वास्तूचं दर्शन घेत होती. अनेक कुटुंबंही मुला-बाळांना घेऊन आलेली दिसली. सर्व जण कुतूहलानं बापूंच्या सगळ्या गोष्टी बघत होते. 
आम्हाला आता तिथून निघायला हवं होतं. तास-दोन तास कसे गेले, ते कळलंही नाही. मुक्ता व यशो आम्हाला तिथंही भेटल्या. त्यांना आता पुण्याला निघायचं होतं. मग त्यांच्यासोबत चहा घेतला. त्याआधी आठवण म्हणून तिथून काही वस्तू खरेदी केल्या. मुक्ता व यशोला बाय करून आम्ही आता पवनार आश्रमाकडे निघालो.
हा आश्रमही तिथून सात-आठ किलोमीटरवर आहे. जवळच्या रस्त्यानं ‘ऑटो’वाल्यानं आम्हाला तिथं नेलं. वर्धा-नागपूर हायवे क्रॉस करून आम्ही धाम नदीच्या तीरावर असलेल्या पवनार आश्रमात पोचलो. आचार्य विनोबा भावे यांच्या दीर्घ वास्तव्यानं पुनीत झालेला हा आश्रम सेवाग्रामच्या तुलनेनं लहान होता. इथं एकच कॅम्पस होता. तिथं आम्हाला गौतम बजाज भेटले. यांच्याविषयी आम्हाला यशोनं सांगितलं होतं. ते आता जवळपास साठ वर्षं याच आश्रमात राहतात. प्रसिद्ध चित्रकार सुजाता बजाज (ज्या आता पॅरिसमध्ये असतात) त्यांची धाकटी बहीण. विनोबांच्या खूप आठवणी त्यांनी सांगितल्या. आम्ही तो आश्रम हिंडून बघितला. मला ‘गीताई’ची प्रत विकत घ्यायची होतीच. ती घेतली. ‘गीता प्रवचने’ हे पुस्तकही घेतलं. बजाज यांच्याशी आम्ही बोलत असताना पुण्यातल्याच आणखी दोन मुली तिथं आल्या. त्याही आमच्यासोबत गप्पा ऐकत थांबल्या. मग त्यांची ओळख झाली. पल्लवी पुरवंत असं त्यातल्या एकीचं नाव. आम्ही सेवाग्राममधून जो ‘ऑटो’ केला होता, तोच आता आम्हाला संमेलनस्थळी सोडणार होता. तो आमच्यासाठी तिथं थांबला होता. मग तिथून निघून अर्ध्या तासात संमेलनस्थळी आलो. भूक लागली होती. म्हणून बाहेरच्या फूड स्टॉलवर जरा चक्कर मारली. तिथं अंबाडी सरबत मिळालं. कोकम सरबतासारखंच लागत होतं. तेव्हा उन्हातून आल्यामुळं त्या सरबतानं जीव अगदी गार झाला. अनेक मंडळी भेटत होती. तिथं मुख्य मंडपात संजय आवटेची भेट झाली. आवटे, मी व मंदार आम्ही २५ वर्षांपूर्वी एकाच दिवशी ‘सकाळ’मध्ये जॉइन झालो होतो. तिघं एकत्र असे खूप दिवसांनी भेटलो. मजा आली. मुख्य मंडपात नागराज मंजुळे, किशोर कदम यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होता. त्यासाठी गर्दी व्हायला लागली होती. मग आम्हीही जागा पकडून बसलो. मुलाखत उशिराच सुरू झाली. आमचे मित्र बालाजी सुतार (आम्ही प्रेमानं त्यांना बासुदा म्हणतो...) सूत्रसंचालनाला होते. त्यात ऐन वेळी सयाजी शिंदेही व्यासपीठावर आले. मग बासुदांसह अरविंद जगताप आणि वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (यांनी मराठीतून आयएएस केले आहे) या तिघांनी नागराज, किशोर व सयाजी यांची मुलाखत एकत्रितपणे सुरू केली. या मुलाखतीसाठी काही पूर्वतयारी किंवा तिघांचे आधी काही बोलणे झाले असावे, असे अजिबात वाटत नव्हते. मुलाखत विस्कळित होत गेली. सयाजी शिंदेंचे वृक्षप्रेम प्रसिद्ध आहे. मात्र, ते दुसऱ्या कुठल्या मुद्द्यावर बोलेनातच. शेवटी नागराज व त्यांचा स्टेजवरच जरासा वाद झाला. आपलं भांडण होईल, असं नागराज त्यांना गमतीत म्हणाला. मग शेवटी ‘आईच्या आठवणी सांगा’ वगैरे विषयांवर मुलाखत आली म्हटल्यावर आम्ही तिथून उठलोच. मुलाखत कशी असावी, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे सकाळची डॉ. बंग यांची मुलाखत होती आणि मुलाखत कशी असू नये, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे ही संध्याकाळची मुलाखत होती. ‘पूर्वतयारी न करता होणारी एकमेव गोष्ट म्हणजे फजिती’ असं पु. ल. देशपांडे म्हणत असत, त्याचीच आठवण झाली.
संध्याकाळी दुसऱ्या मंडपात बासुदांच्या ‘गावकथा’चा प्रयोग होता. मला बासुदा लेखक म्हणून आवडतात. हा प्रयोग कित्येक दिवस बघायचा होता. पण नऊ वाजले तरी त्या छोट्या मंडपात अजून प्रयोगाची तयारी सुरूच होती. मी आत जाऊन बासुदांना भेटलो. त्यांच्या चेहऱ्यावर प्रयोगाचा तणाव स्पष्ट दिसत होता. मी तसं त्यांना म्हटलंही. ‘हा प्रयोग पुण्यात ‘सुदर्शन’ला सर्वाधिक रंगतो,’ असं बासुदांनी सांगितलं. प्रयोग सुरू व्हायला अजून अर्धा तास लागेल, म्हटल्यावर आम्ही जेवायला बाहेर पडलो. आवडते कवी सौमित्रही तिथंच भेटले. मग सेल्फी मस्टच! अर्ध्या तासात आम्ही जेवून आल्यावर मंदारला खरं तर त्या प्रयोगाला थांबायचा कंटाळा आला होता. जवळपास दहा वाजले होते. प्रयोग एकदाचा सुरू झाला. मात्र, थोडी सुरुवात बघितल्यावर आम्ही निघालो. (पुण्यात जेव्हा प्रयोग असेल तेव्हा आता नक्की बघणार...) रूमवर आल्यावर लगेच झोप लागली. दिवसभर दमणूक झाली होती; पण सेवाग्राममधली ती ‘पागल दौड’ शीर्षकाची पाटी सतत डोळ्यांसमोर येत राहिली...


....

रविवार. वर्ध्यातला तिसरा दिवस. सहा फेब्रुवारी. लतादीदींचं प्रथम पुण्यस्मरण. मोबाइलमध्ये ‘रंगोली’ लावली. आज दीदींची गाणी असणार, ही अपेक्षा होतीच. ‘रंगोली’नंही अपेक्षाभंग न करता चांगली गाणी लावली होती. काहीही न करता, डोळे भरून यायला लागले. शेवटी चष्मा ओला व्हायला लागला. तेव्हा तो बाजूला ठेवूनच उरलेली गाणी बघितली. मग आवरून मी व अभिजित ‘आरंभ’मध्ये चहा घेऊन आलो. आज सकाळी फार घाई नव्हती, तरी नाश्त्यासाठी संमेलनस्थळीच जावं लागणार होतं. मग तिघंही ‘ऑटो’ करून निघालो. नेहमीचाच ‘ऑटोवाला’ होता, त्यामुळं नुसतं आत जाऊन बसायचं. तो बरोबर संमेलनाच्या प्रवेशद्वारावर आणून सोडायचा. सकाळी मला ‘सकाळ’मधली एके काळची सहकारी आर्टिस्ट गौरी सावळे-संत हिचा फोन आला होता. तिच्या मुलाचा बालसाहित्य मंचावरील एका कार्यक्रमात सहभाग होता. त्यामुळे ती त्याला घेऊन आली होती.
आम्ही संमेलनस्थळी पोचल्यावर आधी नेहमीप्रमाणे नाश्ता केला. आज इथला शेवटचा दिवस होता, त्यामुळं इथला तो प्रसिद्ध गोरसपाक (दुधात केलेली कणकेची, ड्रायफ्रूट्स असलेली हँडमेड बिस्किटं) घ्यायला आम्हाला मगन संग्रहालयात जायचं होतं. मग चालतच तिकडं निघालो. तिथं गेलो तर रविवारमुळं ते संग्रहालय व गोरस भांडार बंद असल्याचं कळलं. आम्ही कपाळाला हात लावला. कुठल्याही स्थानिक माणसानं आम्हाला ही सर्वांत महत्त्वाची माहिती दिलीच नव्हती. अगदी आम्ही रस्त्यानं मगन संग्रहालयाचा पत्ता विचारत होतो, तेव्हाही लोक पत्ता सांगत होते, पण ते आज बंद असल्याचं कुणीही सांगितलं नाही. (हे मगन असं नाव का आहे, याचा खुलासा संध्याकाळी वर्धा स्टेशनवर झाला. तिथं वर्ध्याची माहिती देणारा मोठा फलक आहे. त्यात महात्मा गांधींचे चुलत भाऊ व सामाजिक कार्यकर्ते मगनलाल गांधी यांच्या नावाने हे संग्रहालय असल्याची माहिती लिहिली आहे.) संग्रहालय बंद असलं, तरी शेजारचं ‘रसोई’ हे रेस्टॉरंट सुरू होतं. इथं नक्की जेवा, असं आम्हाला अनेकांनी सांगितलं होतं. अर्थात आम्हाला संमेलनस्थळीच जेवायचं असल्याचं आम्ही तिथं जेवलो नाही, तो भाग वेगळा! मग समोर एक वर्धिनी नावाचं बचत गटांची उत्पादने विकणारं एक दालन होतं. तिथं गेलो. दारातच सासणे सर भेटले. त्यांच्या ‘सौ.’ तिथं आल्या होत्या. त्यांची मात्र भेट होऊ शकली नाही. आम्ही ‘वर्धिनी’त काही जुजबी खरेदी केली. मात्र, गोरसपाक न घेताच जावं लागणार की काय, अशी परिस्थिती उद्भवली होती. मग तिथं काम करणाऱ्या बायकांनी आम्हाला ‘इंगोले चौकात जा, तिथं अनेक दुकानांत गोरसपाक मिळेल,’ असंं सांगितलं. शेवटी एक ‘ऑटो’वाला गाठला व त्याला इंगोले चौकात जायचंय, असं सांगितलं. आम्हाला गोरसपाक हवाय म्हटल्यावर तो म्हणाला, की तुम्ही मुख्य भांडारात गेला होतात का? आता आम्हाला मुळात असं काही मुख्य आणि उप भांडार आहे हेच माहिती नव्हतं. हा ऑटोवाला पूर्वी गोरस भांडारातच काम करायचा. त्यामुळं त्याला सगळं ठाऊक होतं. त्यानं रिक्षा वळवली आणि आतल्या बाजूच्या एका रस्त्यानं त्या मुख्य भांडारापाशी नेली. तेही बंदच होतं. मात्र, तिथं समोरच त्यांचं एक आउटलेट सुरू होतं. मग तो आम्हाला तिथं घेऊन गेला. तिथं अखेर तो गोरसपाक मिळाला एकदाचा. काही मोजकीच पाकिटं शिल्लक होती. बाकी सगळा माल संपला होता. मग आम्ही एकेक पाकीट घेतलं. नंतर तिथलं दूधही प्यायचं होतं. पंधरा रुपयांना चांगला मोठा ग्लास भरून ते धारोष्ण, अमृतसम दूध समोर आलं. तिथलाच मिल्क ब्रेड घेऊन, दुधात बुडवून मग मी व अभिजितनं त्यावर चांगलाच ताव मारला. दूध प्यायल्यावर तर पोट भरल्याचीच भावना झाली. हे आउटलेट अगदी छोटंसं होतं. हे लोक हातानं हा सगळा माल तयार करतात. त्यामुळं खूप मोठ्या संख्येनं तो तयार होत नाही. तयार झालेला माल लगेच संपतो. त्यात सध्या संमेलनानिमित्त वर्ध्यात पाहुण्यांची प्रचंड गर्दी झाल्यामुळं तर तो संपणार होताच. एकूणच पुण्यातल्या प्रसिद्ध दुकानाची आठवण यावी, असंच या मंडळींचं वर्तन होतं. अर्थात क्वालिटी उत्तम होती, यात वाद नाही. मात्र, जास्त बिस्किटं तयार करावीत, संमेलनात त्याचा वेगळा स्टॉल ठेवावा, असं काही कुणाच्या मनात आलेलं दिसलं नाही. उलट संमेलनाच्या बाहेर असलेल्या स्टॉलमध्ये या मगन संग्रहालयाचाही एक स्टॉल होता. तिथं नंतर चौकशी केली तर, तिथल्या माणसानं जवळपास जीभ बाहेर काढून, कानाची पाळी पकडून, ‘आम्हाला तो (गोरसपाक) इथं विकायला अलाउड नाही,’ असं सांगितलं. ही विरक्ती भलतीच चमत्कारिक होती. असो.

आम्ही पुन्हा संमेलनस्थळी आलो आणि दारातच आम्हाला डॉ. बंग भेटले. आम्ही लगेच त्यांच्याकडे धाव घेतली. फोटो काढले. ते खरं तर गाडीत बसायला निघाले होते, पण आम्ही आमची ओळख दिल्यावर ते आमच्याशी गप्पा मारत बसले. मी पूर्वी ‘सर्च’मध्ये येऊन गेल्याचं त्यांना सांगितलं, त्यावर ‘आता पुन्हा या’ असं आमंत्रण त्यांनी तिथल्या तिथं दिलं. डॉ. राणी बंग सध्या ‘ब्रेन हॅमरेज’नं आजारी आहेत. मात्र, महिनाभरात त्या पूर्ण बऱ्या होतील, असंही डॉक्टरांनी सांगितलं. आदल्या दिवशीच्या मुलाखतीचा विषय अर्थातच निघाला. सुमित्रा भावे विनोबांवर सिनेमा करणार होत्या, तो विषयही मंदारनं काढला. अनेक विषयांवर गप्पा मारून मग डॉक्टर आमचा निरोप घेऊन तिथून गेले.
जरा वेळ मुख्य मंडपातला गांधीजी व विनोबांवरचा कार्यक्रम ऐकत, हवा खात बसलो. सत्राचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे बोलत होते. तो कार्यक्रम संपल्यानंतर गौरीला फोन केला. ती, तिचे यजमान व मुलगा शार्दूल बालसाहित्य मंचाच्या मंडपात होते. मग तिथं जाऊन त्यांची भेट घेतली. शार्दूलला शुभेच्छा दिल्या. नंतर दुपारचं जेवण घ्यायला भोजन कक्षाकडे गेलो. तिकडं जाताना ‘नागपूर मटा’ची सगळी टीम व अपराजित सर भेटले. मग पुन्हा एकदा फोटोसेशन झालं. भोजन कक्षात जेवण झाल्यावर सकाळच्या परिसंवादातले वक्ते व माझे फेसबुक फ्रेंड प्रशांत धर्माधिकारी भेटले. त्यांच्याबरोबर गप्पा झाल्या. ठाण्याच्या वृंदा टिळक व भागवत मॅडम (वृत्तनिवेदक मिलिंद भागवत यांच्या पत्नी) यांची ओळख झाली. जरा वेळानं निघालो. आता थेट हॉटेलवर जाऊन जरा पडावं व मग संध्याकाळची ट्रेन पकडायला बाहेर पडावं, यावर आमचं तिघांचंही एकमत झालं. मग संमेलनस्थळ सोडून आम्ही हॉटेलवर परतलो. आवराआवरी करण्यात जरा वेळ गेला. थोडा वेळ खरोखरच पडलो. साडेपाचला उठून पुन्हा सगळं आवरलं आणि हॉटेल सोडून बाहेर पडलो. चहा घ्यायचा होता, पण ते अमृततुल्य बंद होतं. मग रिक्षा करून स्टेशनवर गेलो. या वेळी त्या शहराचा आकार-उकार जरा लक्षात आला. स्टेशनच्या बाजूला जमनालाल बजाज यांचा पुतळा होता. पुढं तिथली मोठी मंडई लागली. त्या दिवशी तिथला बाजारही होता. भरपूर गर्दी होती. स्टेशनवर पोचल्यावर डावीकडं माघी पौर्णिमेचा भला मोठा चंद्र दिसला. त्याचे फोटो काढले. स्टेशनवर मिलिंद जोशी भेटले. तेही परत पुण्याला निघाले होते. आमच्यानंतर त्यांची ट्रेन होती. आमची ट्रेन पंधरा मिनिटं उशिरा आली. मग वर्ध्याचा निरोप घेऊन बरोबर साडेसातला आम्ही निघालो. येतानाचा प्रवास तसा नेहमीच कंटाळवाणा होतो. सुदैवानं रात्री झोप लागली. सकाळी नगरच्या पुढं ट्रेन आली तेव्हा जाग आली. दौंड कॉर्डलाइन स्टेशनला गाडी थांबली, तेव्हा खाली उतरून छान चहा घेतला. गाडी बरोबर नऊ वाजता वेळेत पुण्यात पोचली. तासाभरात घरी पोचलो. एकदम श्रम जाणवले.
वर्ध्याच्या आठवणींचा कोलाज मात्र हा थकवा घालवायला पुरेसा होता. ‘पागल दौड’ कमी करायची, हा निर्धार करण्यासाठीची शिकवण देणारा हा दौरा चांगलाच लक्षात राहील. इति लेखनसीमा!


---

(उत्तरार्ध)

---

7 Feb 2023

वर्धा डायरी - पूर्वार्ध

वरदेच्या तीरी, शारदेच्या दारी...
-------------------------------------


गेल्या वर्षी वर्ध्याला साहित्य संमेलन घोषित झालं, त्याच वेळी तिथं जायचं असं मी ठरवून टाकलं होतं. चार-पाच वर्षांपूर्वी मी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. त्यात सहज शक्य असूनही आयुष्यात अजूनही न घडलेल्या गोष्टी अशी एक रँडम यादी केली होती. त्यात महाराष्ट्रातील कोणती जिल्ह्याची ठिकाणं मी अजून बघितलेली नाहीत, असा एक उल्लेख होता. त्यात धुळे, भंडारा, वर्धा वगैरे शहरं होती. त्यातलं वर्धा आता बघता येणार होतं. याशिवाय वर्धा म्हटलं, की अपरिहार्यपणे आठवणारे सेवाग्राम व पवनार आश्रम हे दोन्ही बघण्याची संधीही सोडण्यासारखी नव्हतीच. हल्ली आपल्यामागं एवढे व्याप वाढले आहेत, की असं ठरवून वर्ध्यासारख्या ठिकाणी आपण जाणं जवळपास अशक्यच. मग साहित्य संमेलनाचं निमित्त बरं पडतं. संमेलनही अनुभवता येतं आणि पूर्वी कधी न पाहिलं गेलेलं ते शहरही! महाराष्ट्राबाहेर झालेल्या घुमान व बडोदा या दोन संमेलनांना मी, अभिजित पेंढारकर व अरविंद तेलकर असं आमचं त्रिकुट गेलं होतं. नंतर नाशिकमध्ये २०२१ च्या डिसेंबरमध्ये (करोनानंतर झालेल्या) साहित्य संमेलनाला मी व मंदार (कुलकर्णी) असे आम्ही दोघं गेलो होतो. मी, मंदार व अभिजित एकत्रित अजून कुठल्याच संमेलनाला गेलो नव्हतो. म्हणून मग या वेळी दोघांना आवर्जून विचारलं आणि दोघंही तयार झाले. वर्ध्याला जाण्यासाठी रेल्वेच सोयिस्कर असल्यानं मी नोव्हेंबरमध्येच तिकिटं काढून ठेवली. नागपूरला जाण्यासाठी पुण्याहून पुणे-नागपूर सुपरफास्ट व पुणे-नागपूर गरीबरथ अशा दोन थेट गाड्या आहेत. त्यांची वेळही सोयिस्कर होती. या गाड्या एकाआड एक दिवशी धावतात. आम्हाला जाताना पुणे-नागपूर मिळाली, तर येताना गरीबरथ! दोन्ही गाड्यांचं थ्री-टायर एसीचं बुकिंग करून टाकलं. (‘गरीबरथ’मध्ये सर्व डबे थ्री-टायर एसीचेच असतात.)
फेब्रुवारी जवळ येत चालला, तसे वर्ध्याचे वेध लागले. जानेवारीच्या अखेरीस आमच्या नागपूर ऑफिसमधले सहकारी मनोज मोहिते आणि आमचे तेथील संपादक श्रीपाद अपराजित यांच्याशी मी संपर्क साधला. दोघांनीही यथायोग्य मार्गदर्शन करून वर्ध्यात आमची सोय केली. लगेच पैसे भरून हॉटेलही बुक करून टाकलं. (कारण वर्ध्यातील हॉटेलची संख्या आणि येणारे पाहुणे यांचं प्रमाण व्यस्त होतं. त्यामुळं ऐन वेळी हॉटेलमध्ये रूम मिळतीलच याची खातरी नव्हती.) एक फेब्रुवारीला बजेट असतं. तो दिवस ऑफिसमध्ये भरपूर कामाचा असतो. दोन तारखेपासून मात्र माझी रजा होती आणि ट्रेन संध्याकाळची होती. त्यामुळं गुरुवारी सकाळी जरा तयारी करायला वेळ मिळाला.
दोन तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता ही ट्रेन पुण्याहून निघाली. हल्ली ट्रेननं प्रवास फारसा होत नाही. त्यातही मंदार तर जवळपास दहा वर्षांनी ट्रेननं प्रवास करत होता. मीही करोनाकाळानंतर प्रथमच ट्रेननं प्रवास करत होतो. आता सगळंच ‘नॉर्मल’ झालं असल्यानं तसा काहीच प्रॉब्लेम आला नाही. ट्रेनमधल्या खाण्याचा धसका घेऊन आम्हाला घरूनच डबा देण्यात आला होता. तो आम्ही इमाने-इतबारे साडेआठ वाजता खाल्ला. एसी ट्रेन असली, की बाहेरचं फार काही नीट बघता येत नाही. त्यातही या ट्रेननं पुणं सोडल्यानंतर तासाभरातच अंधार झाला. मला ती दौंडची कॉर्ड लाइन बघण्यात इंटरेस्ट होता. पूर्वी सर्व गाड्या दौंड जंक्शनला जाऊन पुन्हा उलट नगरच्या दिशेनं वळायच्या. (म्हणजे पुढचं इंजिन काढून ते मागं लावलं जायचं.) त्यात हमखास अर्धा तास मोडत असे. आता हा बायपाससारखा रूट केल्यानं दौंड जंक्शनला न जाता आणि इंजिन न बदलता थेट नगरकडं गाड्या जातात. हा बायपास दौंडच्या बराच अलीकडं असेल असं मला वाटत होतं. प्रत्यक्षात तो जवळपास दौंडमध्येच आहे. त्यामुळं अंतर फारसं वाचलेलं नाही. मात्र, ट्रेनचा उलट वळसा टळला आहे, हे खरंच. मला एकूणच ट्रेनमध्ये एका जागी बसायला आवडत नाही. मात्र, थ्री टायर एसी हा जरा कंजेस्टेड प्रकार आहे. त्यातही हल्ली बहुतेक हे सगळे डबे फुल्ल असतातच. प्रत्येक प्रवाशाची तऱ्हा निराळी. आपण ग्रुपनं प्रवास करत असलो, तर मजा येते. एरवी एकट्याला बोअर होतं. अनेक जणांना संध्याकाळ झाली, की अंथरूण-पांघरूण पसरून लगेच गुडुप झोपी जायचं असतं. लाइट चालू ठेवावा की नाही, फॅन (एसी असला तरी) लावावा की नाही, यावरून बारीकसारीक कुरबुरी होत असतात. लोक एकूण रागरंग बघून ॲडजस्ट करतात हे खरं. मंदारनं पत्त्यांचा कॅट आणला होता आणि आम्ही कित्येक वर्षांनी त्या रेल्वेत ‘५-३-२’ खेळलो. मात्र, समोरच्या मावशींनी ‘लाइट बंद करा’चा धोशा लावला होता. त्यामुळं खेळ आटोपता घ्यावा लागला. मधला बर्थ लावणं, त्यावर बेडशीट पसरणं आणि ती नीट पसरणं हा एक कार्यक्रमच असतो. त्यातही वरच्या बेडवर बेडशीट घालणं कर्मकठीण. हे सगळे व्याप करून, जीन्स पॅंट आणि शर्टवर तिथं झोपणं हे एक दिव्यच असतं. अनेक लोक रेल्वेत घालायचे वेगळे कपडे आणतात. ते खरं तर योग्य आहे. माझ्या खिशातली नाणी तर हमखास पडतात. अनेक सव्यापसव्य करून अखेर आम्ही तिथं आडवे झालो. माझी रोजची झोपण्याची वेळ एक ते दीड आहे. त्यामुळं सव्वादहाला पडून काय करणार, हा प्रश्नच होता. ‘वागले की दुनिया’ बघून झाली, गाणी ऐकून झाली, तरी झोप येईना. त्यात खालच्या काकांनी वरचा ‘घो’ लावला होता. त्यांच्या घोरण्यामुळं माझी झोप भयानक उडालीच. अखेर केवळ रेल्वेच्या लयबद्ध गतीशी शरीरानं समझोता केला आणि झोप लागली.

सकाळी लवकरच जाग आली तेव्हा बडनेरा जवळ आलं होतं. ‘व्हेअर इज माय ट्रेन’ या ॲपमुळं सगळी बित्तंबातमी कळते, हे एक बरंय. सकाळचा चहा झाला. गाडी थोडी लेट होती. साडेसातच्या ऐवजी आम्ही आठ वाजून २० मिनिटांनी वर्धा स्टेशनला पोचलो. आम्ही बहुतेक मुख्य दाराने बाहेर न पडता, दुसऱ्या एका गेटनं बाहेर पडलो. तिथं अगदी एक की दोनच रिक्षा दिसत होत्या. अखेर पुढं जरा चालून मुख्य रस्त्यावर आलो आणि रिक्षा केली. आमचं ‘विद्यादीप रिजन्सी’ हे हॉटेल तिथून साधारण तीन किलोमीटरवर होतं. रिक्षावाल्यानं शंभर रुपये सांगितले. हा इथला ठरलेला रेट होता तिघांसाठी, हे नंतर कळलं. आम्हाला हॉटेलवर पोचायची घाई होती, कारण संमेलनाचं उद्घाटन सकाळीच होतं. बहुतेकदा ते संध्याकाळी असतं. आम्हाला हॉटेलकडं जातानाच्या रस्त्यावरच ग्रंथदिंडी दिसली. मी लगेच व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं. हॉटेलवर पोचलो. हॉटेलवाल्यानं सगळे पैसे भरा, असं सांगितलं. आधी खोल्या बघून आलो. बऱ्या होत्या. मग सगळे पैसे भरले आणि एकदाचे रूमवर पोचलो. आवरून लगेच संमेलनस्थळी गेलो. मुख्य प्रवेशद्वारावर महात्मा गांधींचा चरख्यावर सूत काततानाचा कटआउट लावला होता. एकूण ते मैदान भव्य दिसत होतं. उद्घाटनाला मुख्यमंत्री येणार होते, त्यामुळं पोलिसांची उपस्थितीही बरीच होती. आम्ही साडेदहाला तिथं पोचलो असलो, तरी उद्घाटन समारंभ सुरू व्हायला वेळ होता. मग आधी पोटोबाची व्यवस्था करायला भोजन कक्षाकडं गेलो. तिथं तीन दिवसांचे नाश्ता, दोन्ही वेळचं जेवण असे प्रत्येकी दोन हजार रुपये भरले आणि आधी ती कुपनं ताब्यात घेतली. ब्रेकफास्ट केला. भूक लागली होतीच. खाऊन, चहा घेऊन मुख्य मंडपात येऊन बसलो. उद्घाटन समारंभ सुरू झाला. स्वागतगीत, मराठी अभिमानगीत, मग एकेक भाषणं असं करत प्रमुख पाहुणे हिंदी साहित्यिक विश्वनाथ प्रसाद तिवारी आणि कुमार विश्वास यांची भाषणं झाली. कुमार विश्वास यांना केवळ पाचच मिनिटं देण्यात आली होती, असं त्यांनीच भाषणात सांगितलं. अर्थात त्यांच्या छोटेखानी भाषणातही त्यांनी जोरदार बॅटिंग करून टाळ्या मिळविल्या. विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते यांचं भाषण प्रभावहीन झालं. ते बऱ्यापैकी तणावातच वाटले. तीच गोष्ट स्वागताध्यक्ष दत्ता मेघे यांची. ते आजारी होते, त्यामुळं बसूनच बोलले. मात्र, त्यांच्या बोलण्यातलं एक अक्षरही कळलं नाही. त्याऐवजी त्यांचं भाषण कुणी तरी वाचून दाखवलं असतं, तर बरं झालं असतं. असो. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू झालं, तेव्हा बारा वाजून गेले होते. त्यांच्या भाषणाच्या वेळी वेगळा विदर्भ आणि पिकांना भाव या दोन मागण्यांसाठी काही लोकांनी गोंधळ केला. पोलिसांनी त्यांना त्वरित बाहेर काढलं. मात्र, नंतर दुसरी बॅच घोषणा द्यायला उठायची. असं एकूण तीनदा झालं. नाही म्हटलं तरी त्या मंडपात अस्वस्थता पसरली. लोक उठून उभे राहिले आणि तिकडं बघू लागले. थोड्या वेळानं स्थिरस्थावर झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी जोरदार बॅटिंग केली. अर्थात, भाषण विस्कळितच होतं. कदाचित, व्यत्यय आल्यामुळं मुद्दाम ते अधिक वेळ बोलले असावेत. मात्र, त्यांचं भाषण संपताच मंडपातले एकदम निम्मे-अधिक लोक उठले आणि बाहेर पडले. संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर थोडाच वेळ बोलणार होते. नंतर त्यांच्या भाषणावर विशेष परिसंवाद ठेवण्यात आला होता. तरीही त्यांचं ते छोटंसं भाषणही त्या बाहेर पडणाऱ्या गर्दीच्या गोंगाटात हरवून गेलं. एवढ्यात गणेश (मतकरी) आला. त्याचा एक परिसंवादात सहभाग होता. मी त्याला आमच्या शेजारी बसायला बोलावून घेतलं. थोड्या वेळानं उद्घाटन समारंभ संपला. तोवर जेवणाची वेळ झाली होती. (या उद्घाटन समारंभाचं सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी प्रभावीपणे केलं. नंतर त्यांच्याशीही भेट झाली.)

संमेलनाचा मुख्य मंडप भव्य होता. शेजारी चार ते पाच लहान मंडप होते. मुख्य मंडपाला आचार्य विनोबा भावेंचं नाव देण्यात आलं होतं, तर मुख्य व्यासपीठाला प्राचार्य राम शेवाळकर यांचं नाव देण्यात आलं होतं. इतर मंडपांपैकी एका मंडपाला विदर्भ साहित्य संघाचे नुकतेच कालवश झालेले अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचं नाव देण्यात आलं होतं. गझल कट्ट्याला अर्थातच सुरेश भट यांचं नाव होतं. ग. त्र्यं माडखोलकर यांच्या नावाने प्रकाशन मंच होता. तिथं कुणालाही आपलं पुस्तक प्रकाशन करण्याची सोय होती. कोपऱ्यात एक मावशी केळकर वाचन मंच होता. पलीकडे विजयराज बोधनकर यांनी काढलेल्या साहित्यिकांच्या अर्कचित्रांचं प्रदर्शन होतं; तसंच वर्ध्यातील स्थानिक छायाचित्रकारांच्या फोटोचंही एक प्रदर्शन होतं. या सर्व लहान मंडपांच्या समोरच ग्रंथप्रदर्शन होतं. पुस्तकाच्या आकाराची दोन भव्य प्रवेशद्वारं होती. एरवी पुस्तक प्रदर्शनांतील गाळे आडव्या-उभ्या सरळ ओळींत असतात. इथं मात्र वेगळी रचना होती. पूर्ण गोलाकार असे स्टॉल होते आणि मधोमध दोन ते तीन ओळींतही काही स्टॉल होते. ही रचना वैशिष्ट्यपूर्ण असली, तरी दिवसभरात सूर्याच्या दिशेनुसार, कुठल्या ना कुठल्या स्टॉलवर ऊन येत होतं. नंतर मग बऱ्याच स्टॉलवर ऊन झाकणाऱ्या कनाती लावलेल्या दिसल्या. या सर्व व्यवस्थेच्या मागच्या बाजूला भोजनकक्ष होता. मुख्य मंडपापासून तिथपर्यंत जायचं तर बऱ्यापैकी चालावं लागत होतं. आम्ही पुस्तक प्रदर्शनात संतोषच्या (देशपांडे) ‘स्टोरीटेल’च्या स्टॉलला भेट देऊन पुढं जेवायला गेलो. जेवणाची कुपन दिल्याशिवाय मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेशच दिला जात नव्हता. त्यामुळं आत फक्त जेवणाऱ्या मंडळींचीच गर्दी होती. जेवणाची व्यवस्था उत्तम होती. स्थानिक पदार्थही होते. जेवण झाल्यावर आम्ही जरा वेळ मुख्य मंडपात येऊन बसलो. तेव्हा आमची ‘नागपूर मटा’ची सगळी टीम भेटली. मनोज मोहिते, विनोद वाघमारे, मुंबईहून आलेली अनुजा चवाथे यांना भेटलो. नागपूरच्या वर्षा किडे-कुलकर्णी फेसबुकवरच्या फ्रेंड. त्यांचीही भेट झाली. जर्नालिझमचा बॅचमेट मनोज भोयर आणि पुण्यात पूर्वी ‘लोकमत’मध्ये असलेला निनाद देशमुख हेही भेटले.
आज संध्याकाळच्या वेळी गीताई मंदिर बघून यावं असं ठरलं. आमचा मित्र आशिष तागडे कालच तिथं जाऊन आला होता. त्याची पोस्ट मंदारनं बघितली होती. मग तिकडंच जाऊ या, असं ठरलं. रिक्षा करून चारच्या सुमारास तिकडं गेलो. त्या परिसराला गोपुरी असं नाव आहे आणि गीताई मंदिर असलेल्या त्या भागाला गोपुरी आश्रम असंच म्हणतात, हे तिकडं कळलं. रिक्षानं आम्हाला तिकडं सोडल्यावर आम्ही आत गेलो. एकदम शांत परिसर होता. ती शांतता मनाला स्पर्शून गेली. आत गेल्यावर कळलं, की जमनालाल बजाज यांचं वास्तव्य इथं होतं. त्यांच्या स्मृती त्या बंगल्यात नीट जतन करून ठेवल्या आहेत. शेजारी ‘विनोबा दर्शन’ नावाचं विशेष प्रदर्शन होतं.

जमनालाल बजाज विनोबांना गुरू मानत होते. त्यामुळंच गुरूंची स्मृती शेजारीच उत्कृष्ट प्रदर्शनाद्वारे जतन करण्यात आली होती. आत फोटो काढायला परवानगी नव्हती. जमनालाल बजाज यांनी एका फोर्ड गाडीचं रूपांतर बैलगाडीत केलं होतं आणि तिला ‘ऑक्स-फोर्ड’ असं नाव दिलं होतं. निळ्या रंगाची ती एका बैलाची गाडी बाहेरच होती. तिचा मात्र फोटो काढता आला. नंतर आम्ही गीताई मंदिराकडं गेलो. मंदिरासारखं जवळपास काही दिसेना. तेव्हा तिथल्या व्यवस्थापकांनी सांगितलं, की हे मंदिर म्हणजे विनोबांनी लिहिलेल्या ‘गीताई’तील ओळी लिहिलेल्या पाषाणशिल्पांचा समूह! आम्ही ते पाषाण बघायला गेलो आणि थक्क झालो. साधारण दोन ते तीन मीटर उंचीच्या पाषाणांवर ‘गीताई’तील अध्यायानुसार श्लोक कोरले होते. अध्याय बदलला, की वेगळ्या रंगांचे पाषाण असायचे. असे एकूण सातशेहून अधिक पाषाण तिथं उभारले होते. हे ‘गीताई मंदिर’ बघून आम्ही थक्क झालो. धन्य वाटलं... मी मंदारला उत्स्फूर्तपणे तिथं ‘फेसबुक लाइव्ह’ करण्याची कल्पना सुचविली. त्याला व अभिजितलाही ती कल्पना आवडली. मग आम्ही तिघांनी तिथूनच एक ‘फेसबुक’ लाइव्ह केलं.

शेजारीच एक विश्वशांती स्तूप होता. त्याच्या आधी एक जपानी प्रार्थना मंदिर होतं. विनोबांच्या काळात तिथं आलेल्या एका जपानी साधूबुवांनी (त्यांचं नाव विसरलो) इथं बरंच काम केलं होतं म्हणे. त्यांच्याच नावाने हे प्रार्थना मंदिर होतं. आत कुणीही नव्हतं. अगदी शांत अन् प्रसन्न वाटलं. आजूबाजूचं भान हरपलं अक्षरश:! दोन मिनिटं तिथं मौन उभा राहिलो आणि बाहेर पडलो. विश्वशांती स्तूपही भव्य होता. त्या परिसरातून बाहेर पडताना संध्याकाळ झाली होती. पाखरांची किलबिल होती. सुंदर डांबरी रस्ता आणि शेजारी पदपथही होता. वर्ध्यातली मंडळी बहुतेक तिथं संध्याकाळी चालायला येत असावीत. कारण आम्ही परत येत असताना तसे बरेच लोक दिसले. रिक्षासाठी आम्हाला बरंच चालून थेट मुख्य रस्त्यावर यावं लागलं. तिथं बऱ्याच वेळानं एक रिक्षा मिळाली. तिथून थेट संमेलनस्थळी आलो. बाहेर काही खाण्याचे स्टॉल होते. तिथं चक्कर मारली. संमेलनाध्यक्षांच्या भाषणावरचा परिसंवाद अजून सुरूच होता. तिथं थोडा वेळ थांबलो. तो परिसंवाद संपल्यानंतर गणेशचा सहभाग असलेला ‘आम्हा लेखकांना काही बोलायचे आहे’ हा परिसंवाद (जवळपास तीन तासांनी उशिरा) सुरू झाला. सुरुवातीला पी. विठ्ठल बोलले. नंतर गणेश बोलला. त्यानं ते लिहूनच आणलं होतं. त्याचं बोलणं झाल्यावर आम्ही तिथून उठलो. मुख्य मंडपात श्रीपाद अपराजित सर भेटले. पुढच्या परिसंवादात त्यांचा सहभाग होता. आमच्याकडे ‘मैफल’ पुरवणीत लिहिणाऱ्या रश्मी पदवाड-मदनकर यांचीही भेट झाली. आम्ही तोवर केवळ फेसबुकवरच भेटलो होतो. अचानक भेट झाल्यानं आनंद झाला. त्यानंतर जेवायचं होतं. बराच उशीरही झाला होता. रात्रीचं जेवण झाल्यावर फार न रेंगाळता बाहेर पडलो आणि रिक्षा करून, नव्हे ‘ऑटो’ करून हॉटेलवर पोचलो.

हा पूर्वार्ध संपवताना हा ‘रिक्षा’ व ‘ऑटो’चा किस्सा सांगितलाच पाहिजे. रात्री हॉटेलवर जाताना मंदारच्या तोंडून ‘रिक्षा’ असा उल्लेख ऐकून आमचा रिक्षावाला भयंकर अपसेट झाला. त्यानं तसं स्पष्ट बोलून दाखवलं. ‘मी एवढे पैसे घालून ऑटो घेतला आणि तुम्ही त्याला रिक्षा म्हणून राह्यले,’ ही त्याची खंत होती. मंदारला तर काय झालं ते कळेनाच. माझ्या लक्षात आलं. इकडं ‘रिक्षा’ म्हणजे सायकलरिक्षा आणि ‘ऑटो’ म्हणजे आपण इकडं जिला ‘रिक्षा’ म्हणतो ती... मी हे मंदारला सांगितल्यावर आता वर्ध्यात असेपर्यंत तरी ‘रिक्षा’ला ‘ऑटो’च म्हणायचं, असं आम्ही स्वत:ला ‘ऑटो-करेक्ट’ करून घेतलं.
साहित्य संमेलनाच्या मंडपाबाहेर आपल्या मायमराठी भाषेनं आमची अशी फिरकी घेतली होती आणि ‘जे सहित घेऊन जातं ते साहित्य’ ही (बहुतेक विनोबांनी केलेली) व्याख्या मनापासून पटली... वर्ध्यातल्या गोड पाहुणचाराचा पहिला दिवस असा भाषेचा धडा शिकवून संपला होता...!


(ता. क. वर्धा शहर हे वर्धा नदीच्या तीरी वसलं आहे. या नदीचं खरं नाव ‘वरदा’ असं आहे. अपभ्रंश होऊन वर्धा झालं आणि शहराचं नावही तेच पडलं.)


(पूर्वार्ध)

उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-------