7 Apr 2017

#सम्याआणिगौरीच्यागोष्टी #सीझन 1

सम्या आणि गौरीच्या गोष्टी...
---------------------------------
                                                                                                  (pascal campion)   
                                                            
इंट्रो 
-----

सम्या अन् गौरी...
आंबा अन् कैरी...
-------------------
समीर : तू हिरवी कच्ची, तू पोक्त सच्ची...
गौरी : आणि तू?
समीर : मी 'आम' आदमी...
गौरी : अरे, कोटीबाज माणसा, काय करू तुझं?
समीर : लोणचं घाल...
गौरी : घालतेच... म्हणजे रोज तोंडी लावता येईल...
समीर : वाहव्वा! पण लोणचं कैरीचं घालतात; आंब्याचं नाही...
गौरी : मग तू घालणार लोणचं माझं?
समीर : नाही... तुला असंच खाणार...
गौरी : दात आंबतील सम्या...
समीर : हो, पण नव्या 'दंत'कथाही मिळतील...
गौरी : हो, सांगू या रोज?
समीर : नक्की!

(२२-३-२०१७)
-----


१.
सम्या मरतंय आज...
--------------------------------

गौरी (कृतककोपानं) : काय रे सम्या, नेहमी काय चॅटवर असतोस?
समीर (हसून) : अगं, हाही एक प्रकारचा व्यासंगच आहे...
गौरी (चेष्टेत) : व्यासंग कसला आलाय, असंग आहे... प्राणाशी गाठ पडेल कधी तरी... लक्षात ठेव...
समीर : आपला छंद हाच आपला व्यासंग असणं ही किती महान गोष्ट आहे, तुला कळायचं नाही...
गौरी : तुझा छंदच तुला छंदीफंदी बनवतोय... कधी तरी फटका बसेल...
समीर : संगमनेरचे कवी अनंत फंदी यांचा 'फटका' प्रसिद्ध आहे... आता समीर छंदीचा फटका ऐका...
गौरी : तू कोट्या कर नुसता... आज कोण भेटलंय चॅटवर?
समीर : तुला काय करायचंय? हे माझ्या वैयक्तिक स्पेसवर अतिक्रमण आहे...
गौरी : सांगायचं नाही म्हणून सरळ सांग... वाकड्यात शिरू नको, अन् डोक्यातही जाऊ नकोस...
समीर : हम दिल में आते है... दिमाग में नहीं...
गौरी : आता माझ्या 'दिमाग'चं तू 'दही' करू नकोस हं...
समीर : मस्त लागू दे दही... मी खाईन...
गौरी : काल माझी कैरी केली होतीस, आज दही करतोयस... आंबटशौकीनच आहेस....
समीर : आता कोण करतंय कोट्या?
गौरी : ते मरू दे... तू कोणाशी बोलतोस, काय करतोस मी विचारणार नाही... माझं प्रेम कायमच असेल...
समीर : हाच तो प्रेमाचा सर्वोच्च आविष्कार... आता तू एवढ्या प्रेमात असताना मी कशाला दुसरीकडं जाऊ?
गौरी : तू नुसता बोलबच्चन आहेस. लेखकही होशील.... बरा लिहायचास... तुझ्या पूर्वीच्या मेल पाहा....
समीर : मेल्या मेलची आठवण बरी केलीस... मला कामाच्या मेल पाठवायच्यायत...
गौरी : मग कर ना मेल्या ते काम... इथं काय गप्पा मारीत बसलाहेस...
समीर : जातो, पण गौरी, मला ते तीन शब्द तुझ्याकडून ऐकायचेत...
गौरी (लाजते) : इश्श, कितीदा सांगायचं मेलं...
समीर : ईईई, ते नव्हे गं...
गौरी : मग, कोणते?
समीर (हसत) : Go to hell... किती प्रेमानं म्हणतेस तू हे तीन शब्द...
गौरी (हातातली उशी फेकत) : सम्या, मेलास तू आता...

(२३-३-२०१७)
----

२.

कांदा प्रेमाचा 
-------------------

समीर : आज मैं उपर... आसमाँ नीचे... आज मैं आगे, जमाना है पीछे...
गौरी : एवढी खूश का आहे स्वारी? 
समीर : प्रेमात पडलोय मी परत... 
गौरी : ई... ते होय.. तू सारखाच प्रेमात पडत असतोस... त्यात काय विशेष?
समीर : प्रेमात पडणं ही एक वृत्ती आहे. अशी वृत्ती असलेला माणूस सारखा कुणाच्या ना कुणाच्या प्रेमात पडत असतो.
गौरी : काही गरज नाही. उगाच आपल्या आवरता येत नसलेल्या भावनांना काही तरी तात्त्विक मुलामा द्यायचा झालं...
समीर : यात मुलामा द्यायचा प्रश्नच नाही. मुळात मी काही असं ठरवून प्रेमात पडत नाही. मला ना, ज्या गोष्टी माझ्यात नाहीत त्या ज्यांच्याकडं आहेत अशा लोकांचं आकर्षण वाटतं. मग मी त्यांच्या प्रेमात पडतो.
गौरी : पड ना... पण मग तुझ्या बाबतीत हे सगळे लोक बायका-मुलीच का असतात?
समीर : हा हा... हल्ली मी एका बाईच्या प्रेमात आहे म्हटलं, तर त्याला टीआरपी आहे अजून...
गौरी : हे काही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही.
समीर : गंमत वाटते खरंच. प्रेम असं ठरवून करता येत असतं तर काय पाहिजे होतं? लोकांनी रेसिपी लिहिल्या असत्या प्रेमाच्या...
गौरी : लोकांनी कशाला? तूच लिहिशील. प्रेमात कसे पडावे याचे शंभर प्रकार...
समीर : लोक वेगवेगळ्या कारणांनी प्रेमात पडतात. दर वेळी ते वेगळं असतं. अनेकदा त्यात कसलीही अपेक्षा नसते. उलट काही तरी द्यावं अशी ऊर्मी असते.
गौरी : काही नाही. बायका असे खांदे शोधतच असतात. तुझा खांदा ही काही पब्लिक प्रॉपर्टी नाही हे नीटच लक्षात ठेव.
समीर : अरेरे, काय हा दुस्वास? अशानं माझ्या प्रेमालाच खांदा द्यायची वेळ यायची...
गौरी : बघ. म्हणजे देत होतास ना खांदे? 
समीर : खांद्यावरून आपल्यात वांधे नकोत... नाही तर माझ्या नाकाला कांदे लावायची वेळ यायची...
गौरी (हसत) : अरे, माझ्या अकलेच्या कांद्या, काय करू तुझं?
समीर : पापुद्रे काढायला सुरुवात कर!
(२४-३-२०१७)
-----
३.
सम्या अन् सानेगुरुजी....
-------------------------------------

समीर : चुप चुप बैठी हो, जरूर कोई बात है...
गौरी (वैतागून) : गप रे, कसली घाणेरडी गाणी म्हणतोयस सकाळी सकाळी?
समीर : घाणेरडं? काहीही हं गौरी... किती छान गाणं आहे हे!
गौरी : हो रे... पण मध्यंतरी ते सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिरातीत वापरलं होतं ना, तेव्हापासून डोक्यात गेलंय...
समीर : अगं पण त्यात वाईट काय? जनजागृतीसाठीच वापरलं होतं...
गौरी : सम्या, शटअप! ज्या विषयातलं आपल्याला कळत नाही ना, त्यावर बोलू नये...
समीर : धिस इज नॉट डन... धिस इज इनजस्टिस... तुम्हा बायकांना आम्ही सगळे पुरुष असेच का वाटतो?
गौरी : असेच म्हणजे कसे?
समीर : म्हणजे... म्हणजे.... सदैव तुमची चेष्टा करणारे, खिल्ली उडवणारे...
गौरी : आणि सदैव आपलं पुरुषपण अंगावर मिरवणारे...
समीर : हे तूच बोललीस ते बरं... पण वाईट वाटतं खरंच...
गौरी : सम्या, अनुभव आहे बाबा... उगाच नाही बोलत...
समीर : माझा पण वाईटच अनुभव आहे? मला वाटतं, की कधी तरी तुझ्या जागी जाऊन विचार करावा... आणि मी अनेकदा तो करतोही... मग मला तुझ्या छोट्या छोट्या राग-लोभांची कारणं कळायला लागतात...
गौरी : अगं बाई, हो? हे कधीपासून झालं म्हणे?
समीर : चेष्टा नको करूस गौरी... मला खरंच वाटतं, माझ्यात ना एक स्त्रीचं मन दडलेलं आहे. जगात चार प्रकारचे लोक असतात. पुरुषी मन असलेले पुरुष, स्त्री-मन असलेले पुरुष, स्त्री-मन असलेली स्त्री आणि पुरुष-मन असलेली स्त्री... खरं तर स्त्रीच्या अशा दोन कॅटॅगरी करणं हे त्या जातीवर सर्वस्वी अन्यायकारक आहे, हे मला मान्य आहे. पण मी अगदी ढोबळ सांगतोय... मी स्वतः दुसऱ्या कॅटॅगरीतला आहे. स्त्री-मन असलेला पुरुष... सानेगुरुजी तसे होते बघ...
गौरी (खो खो हसत) : तू आणि सानेगुरुजी? वारले मी हसून... अरे माणसा, जरा काही तरी विचार कर रे नावं घेताना...
समीर : हेच मला तुझं आवडत नाही. काही नीट समजूनच घेत नाहीस...
गौरी : सम्या यार, खरंच आपल्यात तूच बाई आहेस आणि मी कोण आहे कुणास ठाऊक.... बाई असलेली पुरुष की बाई असलेली बाई, की बाई नसलेली नुसतीच बाई...
समीर : गप गं बाई...
गौरी : सम्या, स्त्री-मन आहे तुझं असा दावा करतोस ना, मग सांग बघू आत्ता माझ्या मनात काय चाललंय ते?
समीर : हां, हे सांगायचं राहिलं... एका बाईचं मन दुसऱ्या बाईलाही कळत नाही...
गौरी : उगाच काही तरी... मला माझ्या मैत्रिणींची मनं कळतात बरोबर...
समीर : असं तुला वाटतं... त्यांना वाटतं का विचार... बादवे, मलाही तुझ्या मैत्रिणींची मनं कळतात... पळा...
गौरी (हसत) : सम्या, आज माझ्या हातून तुझा खून लिहिलाय हे नाही का कळलं तुला, गाढवा...
समीर : कसं मारणार? कच्चं खाऊन की भाजून?
गौरी : पेटवून... ही हा हा हा....

(२५-३-२०१७)
----

४.
स्कॉच आणि पंचामृत...
-----------------------------------

गौरी (गुणगुणते) : तुला पाहिले मी नदीच्या किनारी...
समीर : अरे वा... छान गाणं म्हणतीयेस...
गौरी : आज ग्रेस आहेत डोक्यात सकाळपासून.... किती त्यांच्या कविता, त्यांची रूपकं, त्यांची मिथकं, त्यांची शब्दकळा... त्यांचं जगणं...
समीर : गौरी, खरं सांगू का? मला काही ग्रेस झेपत नाहीत. ते काय लिहितात, ते काही कळत नाही.
गौरी : ग्रेसची सवय व्हावी लागते. कुठलीही चांगली गोष्ट सहज मिळत नाही, हे लक्षात ठेव...
समीर : पण एवढं अवघड लिहायचंच का म्हणतो मी? मला पुलं आवडतात. त्यांनी लिहिलेलं सगळं कळतं...
गौरी (हसते) : तू स्कॉच आणि पंचामृताची तुलना करतोयस...
समीर : व्हॉट डू यू मीन? ग्रेस स्कॉच आणि पुलं पंचामृत?
गौरी : म्हणजे सारख्या नसलेल्या दोन गोष्टींची तुलना... स्कॉच आपल्या जागी, पंचामृत आपल्या जागी... दोन्ही आपल्याला आवडतंच ना... पण त्यांचा आस्वाद घेण्याच्या जागा वेगळ्या आहेत. त्यातून आनंद मिळण्याच्या जागाही वेगळ्या...
समीर : पण मग प्या ना तुम्ही स्कॉच... आम्हाला आमचं पंचामृतच बरं... आणि खरं सांगू का, ग्रेस यांचं जे काही लेखन आपल्याला कळतं, ते वाचलं तरी खचायला होतं... आयुष्यात अपरिमित दुःखाखेरीज दुसरं काहीच नाही का, असं वाटतं... माझ्यासारख्या आयुष्य समरसून जगणाऱ्या माणसाला नकोय हे दुःखाचं गाणं....
गौरी : असं बघ सम्या, आयुष्यात प्रत्येक वेळ वेगळी असते. कधी सुख असतं, तर कधी दुःख... आत्ता तुझ्या आयुष्यात दुःख नाहीय आणि टचवूड, ते कधीच नसो... पण ज्यांनी असं कमालीचं दुःख सोसलंय ना, त्यांना जाणवतं ग्रेसना काय म्हणायचंय ते... कातडी सोलवटून ते शब्द आपल्या रंध्रारंध्रात घुसतात...
समीर : ए बाई, तू ग्रेससारखं बोलू नकोस... असेल त्यांचं दुःख मोठं... पण ते दुर्बोध का असावं?
गौरी : अरे, मुद्दाम दुर्बोध लिहायचं म्हणून कुणी लिहितं का रे? आणि ते तुला दुर्बोध वाटतंय हे लक्षात ठेव. तुला जर्मन आणि जपानी भाषा कळत नाही, कारण तुला ती लिपी येत नाही. ग्रेस जाणून घ्यायचा असेल तर वेदनेची लिपी वाचायला शिकावं लागतं.... त्यासाठी स्वतःचं कशाला, दुसऱ्याचं दुःख जाणून घेता यावं लागतं...
समीर : गौरे, कुठून शिकलीस गं हे सगळं? किती छान बोलतीयेस...
गौरी : ग्रेस वाचून... मला सगळा ग्रेस कळतो असं नाही. किंवा त्याच्याएवढं दुःख मी सोसलं आहे, असंही मला वाटत नाही. पण मी त्यांच्या जागी स्वतःला ठेवून बघू शकते. त्यांनी लिहिलेल्या शब्दांच्या पलीकडचे अर्थ शोधते.
समीर : त्यांनी स्वतःला दुःखाचा महाकवी म्हटलंय... मला हे खरोखर झेपत नाही. मला आपले 'पुलं'च आवडतात. पुलंही काही वेगळं सांगत नाहीत. पण किती छान सांगतात!
गौरी : सम्या, मोठा हो रे... पुलंच्या यत्तेतून बाहेर ये... ग्रेस मोठा माणूस आहे हे ज्या दिवशी तुला कळेल त्या दिवशी तू वाचक म्हणून वयात येशील बघ...
समीर : मला 'चंद्रमाधवीच्या प्रदेशात' घेऊन चल, गौरी...
गौरी (गळ्यात हात टाकत, डोळ्यांत पाहत) : अगं बाई, बाळ मोठं झालं की लगेच...
(२६-३-२०१७)
-----

५.

आस्वाद 
------------

समीर : गौरे, चल की पिक्चर टाकू एखादा...
गौरी : वेडाबिडा आहेस काय रे जरा... आज सोमवार आहे. सुट्टी नाहीय. तू जा एकटा... नाही तर तुझ्या खांदेकरी मैत्रिणी असतीलच की मोकळ्या... 
समीर : किती कुचकं बोलशील?  पण खरंच, परवा एक मैत्रीण विचारत होती, की तू एकटा कसा काय बघू शकतोस सिनेमा? गंमतच आहे.
गौरी : त्यात काय! मलाही नाही आवडत एकटीनं बघायला...
समीर : मला आवडतं. तरी थिएटरमधे बरेच लोक असतात. कुणीच नसेल तर जास्त आवडेल खरं तर...
गौरी : अगं बाई... हो का!
समीर : कुठल्याही कलेचा आस्वाद घेण्याची प्रक्रिया ही अखेर वैयक्तिकच असते... 
गौरी : असं काही नाही. पुस्तक वाचणं हे तसं असू शकतं. तिथं आस्वादन वैयक्तिक पातळीवरच असतं. पण सिनेमा, नाटक या सामुदायिक आस्वादनासाठीच जन्माला आलेल्या कला आहेत.
समीर : नुसतं एकत्र बघणं किंवा एकत्र ऐकणं याला सामुदायिक आस्वादन म्हणता येत नाही. तसं तर काही लोक पुस्तकवाचनाचा कार्यक्रमही करतात. त्याला काय म्हणणार मग! शिवाय आकलनाची प्रक्रिया वैयक्तिकच असते.
गौरी : किती कीस पाडतोयस! शिवाय काही गोष्टींची चिकित्सा होत नसते. मला आवडतं तुझ्या हातात हात घालून  सिनेमा पाहायला... बास! 
समीर (हसत) : हे माझ्या आकलनापलीकडचं आहे...
गौरी : तेव्हा मुद्दा असा की, एकटा कुठं उलथू नकोस!
समीर : नक्की! यापुढं कुणी ना कुणी असेल माझ्यासोबत...
गौरी (उशी फेकून मारत) : तू मेलास आज सम्या...
(२७-३-२०१७)
-----
६.

नीट जा, नीट ये... जेवलास का?
------------------------------------------------

समीर (स्टेअरिंगवर हात नाचवत)​ : आज मैं​ उपर, आसमाँ नीचे... आज मैं आगे, जमाना है पीछे...​
गौरी : सम्या, गाडी हळू चालव... काटा बघ... १२०.... कंट्रोल... तू खूप फास्ट चालवतोस गाडी.... नाही तर खरोखर आज मैं उपर और गाडी नीचे अशी अवस्था व्हायची...
समीर : तू शेजारी बसून मला गाडी कशी चालवायची सांगू नकोस हं... मला कळतं...
गौरी : ए शहाण्या, काळजी वाटते आम्हाला म्हणून बोलतेय...
समीर : तुम्हा बायकांचं मला काही कळतच नाही. अगदी शेजारी बसलीयेस, तरी काळजी, शेजारी नसतानाही काळजी...
गौरी : तुला नाही कळायचं ते...
समीर : ऑफिसला निघताना मेसेज करा, पोचलो की मेसेज करा... जेवलो की मेसेज करा... पाणी पिलो की मेसेज करा, ते आपलं हे ते केलं की मेसेज करा... अरे, आम्ही काय लहान बाळ आहोत काय?
गौरी : प्रेम आहे ना म्हणून... तुला काय करायचंय बाकी? सांगितलंय ना मेसेज करायला, तेवढा गुपचूप करायचा...
समीर : सगळ्या बायका सारख्याच कशा याबाबत?
गौरी : तुला काय रे अनुभव बाकीच्या बायकांचा?
समीर (हसत) : म्हणजे, मित्र सांगतात ना... बायको, प्रेयसी, गर्लफ्रेंड, व्हॉट्सअॅप मैत्रीण, फेबु मैत्रीण, भाजीवाली मैत्रीण, जिमवाली मैत्रीण, लायब्ररीवाली मैत्रीण, मॉलवाली मैत्रीण... सगळ्यांचा आपला एकच फंडा... नीट जा... गाडी सावकाश चालव... पोचलास की मेसेज कर... मी म्हणतो, काय गरज? आणि हो, ते J1 झालं का? तो एक महाइरिटेटिंग प्रकार आहे. तो शब्द तर आता ऑक्सफर्ड डिक्शनरीत घालणार आहेत म्हणे.
गौरी : गप्प बस... तुमची काळजी वाटते, गाढवा, म्हणून हे सगळं...
समीर : अगं हो, कळलं की... पण किती ती काळजी...
गौरी : आम्हा बायकांचं असंच असतं... तुला नाहीच कळणार...
समीर : असं काही नाही. आम्हीही तुमची काळजी करतोच की. पण पुरुषांची काळजी करण्याची पद्धत वेगळी असते...
गौरी : उदाहरणार्थ?
समीर (हसत) : आम्ही तुम्हाला शक्यतो कळूच देत नाही तुम्हाला काळजी वाटेल असं काही...
गौरी (डोळे मोठे करत) : अस्सं काय! सम्या, गुढीची काठी मोकळी होणार आहे संध्याकाळी... तू थांबच...

(२८-३-२०१७)
------

७.

आहे हे असं आहे...!
-------------------------------

समीर : ही गौरी म्हणजे कहर आहे, बाई... थोर, थोर...!
गौरी (लाजत) : एवढं काय मेलं ते कौतुक माझं....
समीर : ए, तुझं कोण कौतुक करतंय? (हातातलं पुस्तक दाखवत) मी या गौरीबद्दल बोलतोय...
गौरी : हं... गौरी देशपांडे... गौरी माझी पण आवडती आहे, तुला माहितीय... एवढी एकच आवड जुळते आपली...
समीर : आणि तुझ्यात आणि तिच्यातही नावापुरतंच साम्य आहे. ती कुठं, तू कुठं?
गौरी : एवढे काही टोमणे मारायला नकोयत... गौरीसारखं जगता येणं हे फार भाग्याचं... एवढं भाग्य प्रत्येकीच्या वाट्याला कुठून येणार?
समीर : गौरी वाचताना आपण वेगळ्याच दुनियेत जातो. तिचं जगणं, तिचे विचार, तिची माणसं सगळंच कसं स्वप्नवत...
गौरी : तिचं जगणं होतंच तसं... पण ते वाचकाला तसं भासतं यात तिच्या लेखनाचंही कौशल्य असणार...
समीर : मला हा अनेकदा प्रश्न पडतो. लेखक व्यक्त होतो तो त्याच्या अनुभवाच्या परिघातच ना... तो जे काही जगला, त्यानं जे काही पाहिलं तेच त्याच्या लेखनात येणार...
गौरी : असंच काही नाही. नाही तर फिक्शन लिहिलं नसतं कुणी. मुळात कुठलंही फिक्शन लेखन म्हणजे वास्तव आणि आभासाचा अद्भुत मेळ असतो... त्यात लेखकाचं जगणं किती आणि आभास किती हे शोधायला जाऊ नये.
समीर : असं कसं? हे कुतूहल असणारच. ज्या व्यक्तीनं एवढं ग्रेट लिहिलंय ती व्यक्ती ग्रेटच असणार ना...
गौरी : असं काही नसतं. लेखक स्वतःचे अनुभव आणि इतरांचेही अनुभव एकत्र करून लिहीत असतो. त्याच्यावर ज्यांचा प्रभाव आहे, ज्या गोष्टी त्याला भारावून टाकतात, ज्या गोष्टी त्याला करायला आवडतात, पण कदाचित करता येत नाहीत अशा सगळ्याच गोष्टी त्याच्या लेखनात उतरू शकतात...
समीर : पण तरीही मला वाटतं, लेखकाचं जगणं महत्त्वाचं आहेच. कारण जगणं हे वास्तव आहे. आता गौरी बघ, जग फिरली प्रत्यक्ष... तर तिचं अनुभवविश्व बघ आणि त्याच काळात पुण्यात दहा ते पाच नोकरी करणाऱ्या अन् फुटकळ दिवाळी अंकांत संसार कथा लिहिणाऱ्या एखाद्या बाईचं अनुभवविश्व... यांची तुलना होईल?
गौरी : अशी तुलना करू नये. आणि गौरीसारखे लेखक ना, वाचकांकडूनही एक किमान प्रगल्भतेची अपेक्षा ठेवून असतात. वाचकाला असं मोठं करणारे लेखक पण आपोआप ग्रेट ठरतात...
​समीर : पण निखळ आनंद देणारे लेखक मोठे नाहीत का?
गौरी : परत तू चुकीची तुलना करतोयस... प्रत्येक वेळेची गरज असते. आपण कायम गोडच खात नाही किंवा सदैव तिखटच खात नाही ना...
समीर : हं, पटतंय. गौरी, त्या गौरीसारखाच मी तुझ्याही प्रेमात आहे...
गौरी : बघ हं... विचार कर.... हा घाट दुस्तर आहे... एकेक पान गळावया लागले, तरी थांग लागणार नाही...
समीर : हा... हा... हा... तरीही तू आवडशीलच.... आहे हे असं आहे!

(२९-३-२०१७)
---

८.

आय अॅम द हॅपीनेस...!
------------------------------------

समीर : गौरी, तुला प्रिया आठवते? आज भेटली होती...
गौरी : कोण प्रिया? तुला छप्पन मैत्रिणी... ही कुठली?
समीर : अगं, ती आमच्या आधीच्या ऑफिसमध्ये होती बघ...
गौरी : हां, तिच्या बॉसबरोबर काही तरी पंगा घेऊन तिनं ऑफिस सोडलं होतं, ती?
समीर : हो. तीच... आज भेटली होती... आम्ही सीसीडीत गेलो मग...
गौरी (संशयानं) : तिचं काय? तुलाच कशी काय भेटली?
समीर : संशयात्म्या, ऐकू घे जरा... ती बोलताना एक वाक्य फार छान म्हणाली...
गौरी : काय?
समीर : ती म्हणाली - आय अॅम द हॅपीनेस...! मला फार आवडलं हे.... किती छान वाक्य आहे ना... आय अॅम द हॅपीनेस!
गौरी : हं.. ठीक आहे. बरं आहे...
समीर : मला याचं महत्त्व फार वाटतं. याचं कारण गेल्या काही वर्षांत ती ज्या प्रकारचं आयुष्य जगली ना, ते मला बऱ्यापैकी माहिती आहे. त्यामुळं त्यातून बाहेर पडून ती आज एवढी फ्रेश दिसत होती, की मलाच खूप छान वाटलं...
गौरी : तुला माहितीय का समीर, हा स्त्रीचा स्वभावधर्म आहे. सगळ्या बायका अशाच असतात. आम्ही आमच्या आयुष्याचं ओझं वाहणं आता बंद केलंय. आम्हाला आता आनंद लुटायचा आहे...
समीर : मला तिचा अॅट्यिट्यूड आवडला. दोन-तीन वर्षांपूर्वी हीच प्रिया काय घायकुतीला आली होती, ते मी पाहिलंय...
गौरी : बायका बदलतात. काळानुसार स्वतःला अॅडजस्ट करतात. तुम्हा पुरुषांनाच नाही जमत हे...
समीर : ती आणखी काय म्हणाली माहितीय का, जोडीदाराला संपूर्ण स्वातंत्र्य देणं हेच प्रेम!
गौरी : कुठली तरी इंग्लिश कादंबरी वाचून आली असेल. त्यातली वाक्यं फेकली तुझ्या तोंडावर... काय रे, तिच्या वाक्यांचं एवढं कौतुक करतोयस... तू स्वतः काय करतोस?
समीर : प्रत्येक गोष्ट स्वतःवर ओढवून घ्यायला नकोय काही अगदी...
गौरी : कळलं ना सम्या, चमकदार वाक्यं टाकणं आणि तसं आयुष्य जगता येणं यात फार फरक असतो ते...
समीर : मला एवढंच कळतं, समोरच्याचं जे चांगलं असेल, ते घ्यावं... मला प्रियाचा अॅट्यिट्यूड आवडला... आता मीही म्हणणार - आय अॅम द हॅपीनेस...
गौरी (गळ्यात पडत) : नो बेबी, आय अॅम युअर हॅपीनेस.....


(३०-३-२०१७)
-----

९.

जेथे 'लाघव' तेथे सीता...
---------------------------------

गौरी : सम्या, चल, मस्त गझलचा कार्यक्रम आहे. जाऊ या...
समीर : मला नाही कळत ते... तू जा...
गौरी : आपली एकही आवड जुळत नसताना आपण का प्रेमात आहोत रे?  
समीर : म्हणूनच आहोत कदाचित... बरं असतं ते! 
गौरी : याला काय अर्थ आहे? एकमेकांच्या साथीनं आपण वाढलं पाहिजे ना! 
समीर : काय गरज? तुझी आवड तुझी... माझी आवड माझी... एकमेकांच्या स्पेसवर अतिक्रमण कशाला? 
गौरी : ही काही सक्ती नाहीय. आणि तू नाही आलास तर माझा काहीच तोटा नाहीय. पण काही गोष्टींचा आनंद एकत्रित लुटण्यात गंमत असते. तुला कधी कळणार?
समीर : ही गंमत दोघांना पण आली पाहिजे ना! 
गौरी : अरे येडू, दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होण्यातली गंमत! मला गझल आवडते तर आपण ती जाणून तरी घ्यावी असं का नाही वाटत तुला?
समीर : खरंय. आम्हा पुरुषांना हे जरा कमी असतं नाही! 
गौरी : जरा? अरे, तुम्हाला काहीच कळत नाही. आम्ही बायका वेड्या... आम्हाला भलत्या अपेक्षा असतात. आम्ही न सांगता तुम्हाला सगळं कळावं अशी आमची अपेक्षा असते. वेडेपणाच की!
समीर : नाही कळत आम्हाला... सरळ सांगितलेलं कळतं. उगाच भलत्या अपेक्षा कशाला? खरंच वेडेपणा!
गौरी : पण कधी तरी करून बघ सख्या हा वेडेपणा! कर के देखो! अच्छा लगता है...
समीर : तुझ्यासाठी येईन गं... गझलच काय, रामाच्या देवळात कीर्तनालाही येईन...
गौरी : हा हा हा... मी जायला हवं ना तिथं... 
समीर : खरंय. 'जेथे राघव तेथे सीता' हे आता शक्यच नाही, नाही का! उलट हल्ली 'जेथे लाघव तेथे सीता' असं असतं. मग हे लाघव दाखवणारा कुणी का असेना! 
गौरी : खरंय... पण मग आम्हाला हे लाघव हवं असतं हे तुम्हाला कधी कळणार? मग कशाला बोलतोस?
समीर : आम्ही नाहीच बोलत. जा... जा...
गौरी (हसत) : चिडतोयस काय वेडू! चल, मी तुला नेतेच गझल ऐकायला! च... ल... 
समीर : आपल्या वादांची गझलच किती गोड आहे!
(१-४-२१७)
----

१०.

सहेला रे...
---------------

गौरी : सम्या, कुठं गायब होतास रे एवढे दिवस?
समीर : बरं असतं असं गायब झालेलं... नाही तर अतिपरिचयात अवज्ञा होते...
गौरी : तुझा काय परिचय व्हायचा राहिलाय आता मला? आणि अवज्ञा तर तू करतोसच... त्यातही काय विशेष नाही...
समीर : तिरकस बोलणं सोडू नकोस हं अगदी...
गौरी : बरं, ते राहू दे... कुठं गेला होतास? काय करत होतास? गझलेच्या कार्यक्रमाविषयी काही बोलला नाहीस...
समीर : कधी कधी ना असं वाटतं, काही बोलूच नये. प्रत्येक वेळी आपली प्रतिक्रिया शब्दांत मांडता येतेच असं नाही. मग शांत बसावं असं वाटतं...
गौरी : हे अगदीच खरंय. मला काही काही सिनेमे पाहताना असं होतं. एकदा असं वाटतं, की तुला सांगावं, यावर काही तरी लिही... पण नंतर वाटतं नकोच. आपल्या मनात त्या कलाकृतीविषयी जे काही आतून वाटतं ना, ते तसंच राहावं असं वाटतं. कितीदा असं होतं ना...
समीर : हो, एखादं सुंदर गाणं ऐकलं, सुंदर चित्र पाहिलं, किंवा अगदी छान रंगलेली मॅच पाहिली तरी मला असं होतं...
गौरी : परवा किशोरीताई गेल्या, तेव्हा नाही का... आपण फक्त शांत बसलो आणि 'सहेला रे' ऐकलं.... मग ऐकतच राहिलो... लूपमध्ये... झोप लागलीच नाही...
समीर : कशी लागणार? कलाकार हादेखील मर्त्य माणूसच. पण त्याची कला त्याला कशी अजरामर करून ठेवते बघ! आता किशोरीताई केवळ ऐहिक अस्तित्वानं आपल्यात नसतील. त्यांच्या मैफली, त्यांचा आवाज असेलच आपल्यासोबत....
गौरी : म्हणून काही तरी असं अविस्मरणीय करून जायला हवं बघं सम्या...
समीर : आपली कुठली आली आहे एवढी कुवत?
गौरी : अरे, कुवतीचा मुद्दाच कुठं येतोय यात... तुझ्या परीनं तू जे आयुष्य जगतोयस ना, ते चांगलं जगायचा प्रयत्न कर. चांगलं बघ, चांगलं वाच, चांगलं लिही... आता तुला चांगलं लिहिता येतं ना, मग तू तेच काम कर आणि जे करशील ते सर्वोत्कृष्टच असेल याचा ध्यास घे....
समीर : पण हे 'चांगलं' ठरवणार कोण?
गौरी : तू आतून, मनापासून लिहिलंस ना की ते चांगलंच असतं बघ. मला माहितीय. मी एवढी वर्षं पाहतेय तुला लिहिताना... तू तसं लिहिलेलं मला लगेच कळतं आणि तेच आवडतं...
समीर (हसून) : आणि प्रेम करतेस म्हणूनही आवडत असेल...
​गौरी (गळ्यात हात टाकत) : प्रेमात अवघा रंग एक झाला, की असंच होत असतं....

(७-४-२०१७)

 ----

सीझन २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा...




No comments:

Post a Comment