16 Apr 2017

पातळ आणि पातळी - मटा लेख

पातळ आणि पातळी... 
----------------------

महाराष्ट्राला विनोदाचे वावडे नाही. या प्रांतात अनेक विनोदी कलाकार, लेखक, नाटककार, दिग्दर्शक होऊन गेले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून ते पु. ल. देशपांड्यांपर्यंत विनोदी लेखनाची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. तीच गोष्ट विनोदी भूमिका करणाऱ्या कलावंतांची. दामुअण्णा मालवणकरांपासून शरद तळवलकरांपर्यंत आणि अशोक सराफपासून ते मकरंद अनासपुरेपर्यंत अनेक कलावंतांनी इथला विनोद समृद्ध केला आहे. आचार्य अत्र्यांपासून ते वसंत सबनिसांपर्यंत अनेक नाटककारांनी प्रेक्षकांना गडाबडा लोळायला लावतील एवढी तुफान विनोदी नाटके लिहिली आहेत. अशा या महाराष्ट्रात सध्या विनोदनिर्मितीचा हिणकस प्रकार रुजू पाहतो आहे. तो म्हणजे पुरुष कलाकारांनी साडी नेसायची आणि स्त्रीरूपात काही तरी विनोद करायचे... विशेषतः 'चला हवा येऊ द्या'सारख्या लोकप्रिय कार्यक्रमात हे वारंवार घडताना दिसतं आहे. याशिवाय पुरस्कार सोहळ्यांचे कार्यक्रम, काही मालिका यातही हेच होताना दिसतं. विनोदनिर्मिती करण्याचे सर्व मार्ग संपल्यासारखे जो उठतो तो साडी नेसतो आणि विनोद करू लागतो, अशी स्थिती झालेली दिसते. हे जे काही चालले आहे, त्यात विनोद तर नाहीच; उलट बीभत्स रस ओतप्रोत वाहताना दिसतो आहे या संबंधित मंडळींच्या लक्षात येत नाही काय? येत असेल, तर ते केवळ नाइलाजाने, पोटासाठी हे प्रकार करीत आहेत काय? आणि लक्षातच येत नसेल, तर मात्र त्यांच्या एकूणच वकुबाविषयी शंका घ्यायला पुष्कळ संधी आहे, हे नक्की. असे प्रकार वारंवार लोकांसमोर येत राहिले, तर विनोदनिर्मिती अशीच असते आणि असं काही तरी केलं तरच तो विनोद, अशी अत्यंत चुकीची समजूत नव्या पिढीसमोर तयार होण्याची शक्यता आहे आणि ते अधिक धोकादायक आहे. त्यामुळंच या सर्व कलाकारांविषयी आदर बाळगूनही असं सांगावंसं वाटतं, की गड्यांनो, आता पातळ सोडा! कारण पातळी तुम्ही खूप आधीच सोडली आहे...
महाराष्ट्रात पुरुषांनी साडी नेसून काम करण्याची परंपरा पुष्कळ जुनी आहे. पूर्वी महिलांना रंगमंचावर काम करायची परवानगी नव्हती, म्हणून नाइलाजानं पुरुषांना हे काम करावं लागायचं. या नाइलाजाच्या संधीचं सोन्यात रूपांतर केलं ते नारायणराव राजहंसांनी, अर्थात बालगंधर्वांनी... बालगंधर्वांच्या स्त्री-रूपाविषयी पुष्कळ वेळा लिहून, बोलून झालं आहे. त्याविषयी पुनःपुन्हा सांगण्यात अर्थ नाही. एक मात्र नक्की. बालगंधर्वांनी साकारलेली स्त्री ही कधीच हिणकस वा उथळ वाटली नाही. स्त्रीच्या सर्व मानमर्यादांचं यथायोग्य पालन करूनच त्यांनी त्या भूमिका साकारल्या होत्या. स्त्रीदेह हा परमेश्वराचा एक चमत्कार आहे. तो आपल्याला लाभला नाही, याची समस्त पुरुषांनी जरूर खंत करायला हवी. मात्र, त्याच वेळी नाटकापुरतं का होईना, त्या रूपात जाण्याची संधी मिळाली तर आधी तो देह समजून घ्यायला हवा. तो देह समजून घ्यायचा तर आधी स्त्रीचं मन समजून घ्यायला हवं. आपल्या भूमिकेचा अभ्यास म्हणून तरी हे करायला हवं. बालगंधर्व असा अभ्यास करीत असत, हे त्यांच्या भूमिकांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून अगदी स्पष्टच दिसतं. जाड्याभरड्या, केसाळ देहाला पाचवार वस्त्र गुंडाळलं म्हणजे पुरुषाची स्त्री होत नाही. असं करणं म्हणजे स्त्रीदेहाला अपमान आहे. असं म्हणतात, की वेडा माणूस हा निर्भय असतो. त्याला कशाचंच भय वाटत नाही, कारण त्याला ते भय जाणवतच नाही. स्त्रीचा वेष धारण करण्यामागचं भय आपल्याकडं लोकांना त्यामुळंच जाणवत नसेल का? 
बरं, साडी गुंडाळली, तर गुंडाळली. पण स्त्रीचा वेष धारण करून करायचं काय? तर अत्यंत पाचकळ, तिसऱ्या दर्जाचे विनोद. ज्या विनोदांना आता इयत्ता दुसरीची मुलंही हसत नाहीत, असे कथित, पांचट विनोद! महाराष्ट्रात चांगला विनोद लिहिणाऱ्यांची वानवा आहे, अशी खंत परवाच द. मा. मिरासदारांनी बोलून दाखविली. ते अगदी खरं आहे. चांगला विनोद लिहिला जात नाही, म्हणून तर हे साडी नेसण्याचे केविलवाणे प्रयोग करावे लागतात. चांगला विनोद लिहायचा तर तो लेखक माणूस म्हणून फार मोकळ्या मनाचा, समृद्ध जीवन जगणारा, सर्व कलांचा आस्वाद घेणारा असा हवा. त्याला आजूबाजूच्या भवतालाचं भान हवं. माणसांच्या जगण्याची ओळख हवी. चांगलं लिहिणं, चांगलं वाचणं, चांगलं बोलणं यातून त्याला आशयसमृद्ध जगण्याची चव कळायला हवी. त्यानंतर तो अशा जगण्याचा अभाव असलेल्या जीवनशैलीतील विसंगती टिपून विनोदनिर्मिती करू शकेल ना! इथं मुळात अशा जगण्याचीच ओळख नसेल, तर त्यातली विसंगती लक्षात येणार तरी कशी? एखाद्याच्या लिंगावरून, वर्णावरून, व्यंगावरून केले जाणारे विनोद हे विनोद नसतातच. तो आपल्या मनातील विकृतीचा हिणकस आविष्कार असतो. हल्ली ही विकृतीच सगळीकडं विनोद म्हणून थोपली जात असल्याचं चित्र दिसतं. यातून पुढच्या पिढीला सकस विनोद म्हणजे काय, हेच कळणार नाही हा यातला सर्वांत मोठा धोका आहे. 
पुरुष कलाकारांनी साडी नेसूच नये असं इथं मुळीच म्हणणं नाही. प्रयोग करायला सर्वांनाच आवडतात. कलाकार स्वतःला आव्हान देत असतो आणि ते योग्यही आहे. विजय चव्हाण यांनी साकारलेली 'मोरूची मावशी' किंवा कमल हसननं साकारलेली 'चाची ४२०' ही चांगल्या भूमिकांची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. दिलीप प्रभावळकर 'हसवाफसवी'त साडी नेसून यायचे तेव्हाही ते कधीच हिणकस वाटले नाहीत. याचं कारण या सर्व कलाकारांनी स्त्री-भूमिका साकारताना कुठलाही अभिविनेश न बाळगता, त्या पात्रातील स्त्रीत्वाला शरण जाण्याचा मार्ग पत्करला होता. त्यातून त्यांनी उभी केलेली स्त्री प्रेक्षकांना स्वीकारार्ह वाटली होती. 'अशी ही बनवाबनवी'मध्ये सचिननं घेतलेलं स्त्री-रूप सर्वांनाच बेहद्द पसंत पडलं होतं. याचं कारण त्या भूमिकेतल्या स्त्रीचं मन अभिनेता सचिननं जाणून घेतलं होतं. स्त्रीच्या देहबोलीचा खूप बारकाईनं अभ्यास केला होता आणि स्त्रीच्या स्त्रीत्वाचा कुठंही अपमान होणार नाही, अशाच पद्धतीनं ती भूमिका पडद्यावर साकारली होती. 
मात्र, अशा गोष्टी अपवाद म्हणूनच ठीक असतात. सचिननंही एकदाच स्त्री-भूमिका केली. आयुष्यभर तो त्या भूमिका करत बसला नाही. अगदी अलीकडं टीव्हीवर वैभव मांगलेची एक मालिका आली होती. वैभव उत्तम कलाकार असला, तरी त्या स्त्री-वेषात तो हिडीसच दिसत होता. अनेक कलाकारांना स्त्री-वेष शोभत नाही. विशेषतः शरीर योग्य नसेल तर अजिबात नाही. त्यातही अॅस्थेस्टिक्सबाबत आपल्याकडं एकूणच आनंदीआनंद आहे. त्यामुळं आपण उभं केलेलं स्त्री-रूप हे हिडीस दिसतं आहे, हेच यांना अनेकदा कळत नाही. कळत असेल आणि तरीही बाष्कळ विनोदनिर्मितीसाठी ते याचा वापर करत असतील तर मात्र ते अधिक गंभीर आहे. 
केदार शिंदेच्या 'अगं बाई अरेच्चा'मधल्या नायकाला - श्रीरंग देशमुखला- अचानक बायकांच्या मनातलं ऐकू येऊ लागतं. हल्ली स्त्री-वेष घेऊन हिडीस विनोद करणाऱ्या कलाकारांना जर बायकांच्या मनातलं ऐकायला आलं, तर मनातल्या मनात त्यांचं जे वस्त्रहरण होईल, त्यापासून सोडवायला कोणताही 'श्रीरंग' येऊ शकणार नाही, एवढं मात्र नक्की.
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे - दि. १६ एप्रिल २०१७)
---

No comments:

Post a Comment