12 Dec 2022

दमण-मुंबई डायरी - पूर्वार्ध

हा सागरी किनारा...
------------------------


कोव्हिडपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये आपल्याकडे जो उठत होता, तो हंपीला जात होता. सोशल मीडियावर हंपीवाल्यांचे फोटो बघून मला न्यूनगंड आला आणि मी तशी पोस्टही टाकली. त्या वर्षी मला हंपीला जायला काही जमलं नाही आणि नंतरची दोन वर्षं तर शक्यच नव्हतं. म्हणून यंदाच्या डिसेंबरमध्ये पहिली संधी मिळताच हंपीला जाण्याचं निश्चित करून टाकलं. माझ्यासह धनश्री, माझा आतेभाऊ साईनाथ आणि त्याची बायको वृषाली असे आम्ही चौघं जाणार होतो. अगदी हॉटेल बुकिंग वगैरे पण केलं होतं. मात्र, अचानक सीमाप्रश्न भडकला आणि जरा काळजी वाटायला लागली. आम्ही आमची कार घेऊन जाणार होतो आणि बेळगावात मुक्काम करून पुढं जायचा विचार होता. पण मग एकूण चिघळती परिस्थिती पाहता दोन दिवस आधी हंपीला जाणं जड अंत:करणानं रद्द करून टाकलं. अर्थात रजा होती, त्यामुळं कुठं तरी जायचं हे ठरलं होतंच. मग स्वाभाविक पर्याय आले ते गोवा किंवा कोकण हेच. मात्र, इथली बहुतेक ठिकाणं बघून झाली होती आणि डिसेंबरमध्ये कोकणात एकूणच हॉटेलांपासून सर्वच सेवा महाग मिळतात आणि कदाचित निकृष्टही! म्हणून मग ते पर्याय बाद झाला. अजून बघितलं नाही अशा ठिकाणी जाऊ या यावर आमचं चौघांचं एकमत झालं होतं. मी मनातल्या मनात महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा नकाशा आणला आणि कोकणातून वर वर जाऊ लागलो. डहाणूच्या परिसरात कुठं तरी जावं असं वाटू लागलं. आणि अचानक डोळ्यांसमोर नाव आलं ते दमणचं. दीव, दमण आणि दादरा-नगर-हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहेत, एवढंच शाळेत शिकलेलो. त्यापलीकडं दमणविषयी फारशी माहिती नव्हती. तिथं समुद्रकिनारा आहे आणि तिथंही पोर्तुगीजांची राजवट होती, म्हणजे गोव्यासारखंच वातावरण असेल असा एक अंदाज होता. याशिवाय दारूबंदी असलेल्या गुजरातमधले अनेक मद्यप्रेमी लोक खास मद्यपानासाठी दमण आणि सिल्व्हासाला येतात, हे ऐकून माहिती होतं. हंपीच्या तुलनेत (पुण्याहून ५६५ किलोमीटर) दमणचं अंतरही (३१३ किमी) पुष्कळ कमी होतं. मुंबईवरून जावं-यावं लागणार होतं, त्यामुळं मुंबईला जाण्याची संधी मी सोडणं शक्यच नव्हतं. शेवटी दमणला दोन दिवस आणि मुंबईत दोन दिवस राहू या, असं ठरवलं आणि तशी हॉटेलची बुकिंग करून टाकली. 
बुधवारी (७ डिसेंबर) दत्तजयंतीच्या शुभमुहूर्तावर सकाळी आठ वाजता आम्ही दमणच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं. ‘श्री दत्त’मध्ये ब्रेकफास्ट करणं आलंच. दत्तजयंती आणि ‘श्री दत्त’ आणि मी श्रीपाद यावर माफक विनोदही करून झाले. तिथं झकास थालिपीठं आणि सुंदर दही मिळाल्यानं मजा आली. चहा घेतला आणि गाडी पुढं दामटली. ठाण्यात शिरल्यावर ट्रॅफिक जॅम लागेल हा अंदाज होताच आणि तसंच झालं. एके ठिकाणी मी सुकाणू साईनाथकडं दिलं आणि वाढत्या ठाण्याच्या विस्ताराकडं डोळे विस्फारून बघू लागलो. मी ठाण्यापर्यंत आलो असलो, तरी इथून पुढचा प्रदेश मला नवा होता. कार घेऊन दिवसा प्रवास करण्यामागे तो प्रदेश बघण्याचा उद्देश होताच. मला स्वत:ला रात्री प्रवास करायला आवडत नाही, ते यासाठीच! ठाण्याच्या बाहेर पडल्यावर टोपोग्राफी एकदम बदलते. डोंगर लागतात. जरासे मातकट आणि धूळभरले! मालवाहू ट्रकची संख्या प्रचंड आणि तुलनेनं रस्ता खराब. वसईच्या खाडीपर्यंत हेच सुरू राहिलं. मुंबईकडून येणारा रस्ता आणि ठाण्याहून येणारा रस्ता जिथं एकत्र मिळतात, तिथं फ्लायओव्हरचं काम सुरू आहे. त्यामुळं हे ट्रॅफिक जॅम होत असल्याचं आम्हाला तिथं पोचल्यावर कळलं. हळूहळू गर्दीतून ती खाडी ओलांडून आम्ही मुंबई-अहमदाबाद महामार्गाला लागलो आणि दमणुकीमुळं लगेच आलेल्या पहिल्याच हॉटेलमध्ये जेवायला थांबलो. काठियावाडी असं नाव असलेल्या त्या हॉटेलात गुजराती पद्धतीचं जेवलो. आम्ही अजून महाराष्ट्रातच असलो, तरी गुजरातचा प्रभाव आजूबाजूच्या हॉटेलांवर दिसू लागला होता. अगदी गुजराती पाट्याही इथूनच सुरू झाल्या. मुंबई-अहमदाबाद रस्ता काही ठिकाणी खराब असला, तरी बराचसा चांगला आहे आणि सहा लेनचा आहे. त्यामुळं इथून पुढं साईनाथनं गाडी सुसाट दामटली. महाराष्ट्राची हद्द बरीच पुढपर्यंत आहे. तलासरी हे मोठं गाव या महामार्गावर लागतं. (माझा ओक वाड्यातला एक मित्र या गावचा. त्याची आठवण आली...) त्यानंतर गुजरात-महाराष्ट्र राज्यांच्या चेकपोस्ट. त्यानंतर अच्छाड हे महाराष्ट्राच्या हद्दीतलं शेवटचं गाव. तिथून पुढे अगदी २०-२५ किलोमीटरवर वापी आहे. दमण हे समुद्रकिनाऱ्यावर असल्यानं १६ किलोमीटर आत डावीकडे आहे. थोड्याच वेळात तो फाटा आला. तिथं लगेच एक रेल्वे क्रॉसिंग लागलं. ते ओलांडून पुढं गेल्यावर दमणचा रस्ता लागला. दमण या केंद्रशासित प्रदेशाची हद्द अगदी पाच किलोमीटर अलीकडं सुरू होते. तो फलक आला आणि एकदम खराब रस्ता लागला. केंद्रशासित प्रदेशाची ही परवड बघून जरा धक्काच बसला. मात्र, पुढं सगळीकडं चांगले रस्ते लागले.

दुपारी चारच्या सुमारास, आठ तासांच्या प्रवासानंतर आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोचलो. हॉटेलच्या परिसरात अजिबात घरं किंवा वर्दळ नव्हती. हे दमण नव्हतंच. दमणच्या जवळ असणारं परियारी नावाचं गाव होतं. त्या गावात आमचं हॉटेल होतं, हे नंतर आम्हाला कळलंच. जांपोर नावाचा इथला बीच आमच्या हॉटेलपासून अगदीच जवळ होता. मग संध्याकाळी तिथं गेलो. समुद्र पुष्कळच आत गेला होता. पौर्णिमा आणि त्यात ओहोटी... मात्र, एवढा आत गेलेला आणि कमालीचा शांत समुद्र मी पहिल्यांदाच बघत होतो. इथले बीच ‘मडी’ (चिखलयुक्त) आहेत, ही माहिती आधी समजली होतीच. त्यामुळं इथं गर्दीही जरा कमी होती. आमची थोडी निराशाच झाली तो बीच बघून... मात्र, बीचलगत बांधलेला रस्ता आणि तिथं उभारलेले दिव्यांचे खांब अगदी आकर्षक होते. इथं एवढी कमी गर्दी बघून आम्हाला खरं तर कसं तरीच होत होतं. आपल्या इथं प्रत्येक पर्यटनस्थळी एवढी गर्दी असते, की बस! त्या तुलनेत इथं गर्दी होती, पण ती फारच किरकोळ! आमच्याकडं गाडी असल्यानं आम्ही तो परिसर जरा पिंजून काढावा म्हणून निघालो. त्या बीचच्या कडेनं केलेल्या सुंदर रस्त्यानं दोन-अडीच किलोमीटर गेल्यावर आम्हाला ‘नानी दमणकडे’ अशी पाटी दिसली. आम्ही लगेच तिकडं गाडी वळवली. थोड्याच वेळात एकदम मोठं गाव लागलं. पेट्रोलपंप, मोठमोठी दुकानं, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि जरा रहदारी हे बघितल्यावर जरा जीवात जीव आला. दमणचे दोन भाग आहेत. एक नानी (म्हणजे छोटं) दमण आणि एक मोटी (म्हणजे मोठं) दमण. यात गंमत अशी, की प्रत्यक्षात नानी दमण हे मोठं आहे आणि मोटी दमण लहान. अर्थात मोटी दमणकडं असलेली एक भव्य गोष्ट लवकरच आम्हाला दिसणार होती. आम्ही त्या रस्त्यानं जरा पुढं गेलो तर एक भव्य, दगडी, आडवी भिंत लागली. एखाद्या धरणाची असावी अशी ती महाकाय भिंत कशाची असावी, याचा विचार करू लागलो तोच दिसलं, की हा तर दमणचा प्रसिद्ध सेंट जेरोम किल्ला आहे. आम्ही लगेच गाडी त्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत घेतली. समोरच एक रणगाडा ठेवलेला होता. किल्ल्याच्या भिंतीवर तीव्र प्रकाशझोत सोडले होते. सभोवती नीट राखलेली हिरवळ होती. आम्ही तिथं भरपूर फोटो काढून घेतले. किल्ल्याच्या भोवती एक चक्कर टाकली. या किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचं काम २०१९ मध्ये झाल्याचा फलक तिथं लावला आहे. किल्ल्याच्या आत दमण नगर परिषदेचं कार्यालय आणि इतर सरकारी कार्यालयं आहेत. अगदी शेवटी गेल्यावर दीपगृहाकडं जाणारा रस्ता दिसला. मात्र, संध्याकाळ झाल्यामुळं तिथला प्रवेश बंद झाला होता. आम्ही तिथून परत फिरलो. पुढं जाऊन डावीकडं वळलो तर दमणगंगेवरचा पूल लागला. या नदीमुळंच दमणचे हे दोन भाग पडले आहेत. समुद्राच्या मुखाजवळचा भाग असल्यानं नदीत भरपूर पाणी होतं. हा पूल ओलांडून पुढं गेल्यावर नानी दमणमध्ये जरा फिरलो. तिथंच एक कुट्टी नावाचं दाक्षिणात्य रेस्टॉरंट होतं. तिथं चांगलं जेवण मिळालं. रात्री रमतगमत हॉटेलवर आलो. तोवर भरपूर गाड्या येऊन पार्क झालेल्या दिसल्या. एकूण परियारीतलं आमचं हे हॉटेल बरंच लोकप्रिय असावं असा अंदाज आला. हॉटेल चांगलंच होतं. रात्री तिथल्या हिरवळीवर गप्पा मारत बसलो. 
दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्याच हॉटेलमधला काँटिनेंटल ब्रेकफास्ट घेतला. बाहेर पडल्यानंतर आधी देवका बीचला जायचं ठरवलं. तो बराच दूर होता. पण तिथं गेल्यावर बरंच नवं काम सुरू असलेला कोस्टल रोड दिसला. पण तो स्पॉट इतका भारी होता, की फोटोशूटला पर्याय नव्हताच. मग रील्स, फोटोशूट असं सारं साग्रसंगीत भर उन्हाचं करून झाल्यावर तिथून जवळच असलेल्या मीरासोल गार्डन या ठिकाणी गेलो. 

आपल्या सारसबागेसारखं, पण जरा छोटं असं हे ठिकाण आहे. एक सुंदर तळं आणि मधोमध रेस्टॉरंट अशी रचना आहे. तिथं बोटिंग, टॉय ट्रेन पण होत्या. आम्ही तिथं पेडल बोटिंग केलं. भर दुपारी त्या तळ्यात हे बोटिंग करणारे आम्हीच (वेडे) होतो. पण २० मिनिटं पेडलिंग करून व्यायामही झाला आणि मजाही आली. मग तिथंही भरपूर फोटो झाले. त्याच कोस्टल रोडवरून येताना समुद्राला भरती आलेली दिसली आणि आमच्याही आनंदाला भरती आली. आता समुद्र बीचच्या पुष्कळ जवळ आला होता. आम्ही एके ठिकाणी गाडी थांबवली आणि तिथं जाऊन एकदाचे पाय भिजवले. नंतर तो रस्ता संपेपर्यंत प्रवास केला आणि डाव्या बाजूला एकदम एक छोटा, गढीसारखा किल्ला दिसला. हा नानी दमण फोर्ट. मग तिथं गाडी लावून आत गेलो. आत एक चर्च आहे. एका शाळेचा काही तरी कार्यक्रम होता, त्याची तयारी सुरू होती. आम्ही त्या किल्ल्याच्या बुरुजांवरून चारी बाजूंनी एक चक्कर मारली. आता उन्ह जाणवत होतं. भूकही लागली होती. मग बाजारपेठेत जरा चौकशी करून एका हॉटेलात गेलो. तिथं गुजराती थाळीची ऑर्डर दिली. भूक लागल्यामुळं आम्ही चौघंही त्या थाळीवर तुटून पडलो. मस्त जेवण झालं. तिथून मग पुन्हा त्या मोठ्या किल्ल्यात दीपगृह बघायला गेलो. चार-सव्वाचार वाजले होते. दीपगृहाच्या इथं जरा गर्दी दिसली. तिथून समोरच नानी दमणचा बीच दिसला. हा बीच अधिक देखणा दिसत होता. तिथं वॉटरस्पोर्ट आणि इतर ॲक्टिव्हिटी पण सुरू असलेल्या दिसल्या. गर्दीही होती. मग तिथून उतरून थेट त्या बीचवरच गेलो. इथल्या बीचवर बारीक वाळू होती. तिथंच बसलो. समोर बरेच लोक वॉटर स्पोर्टचा आनंद लुटत होते. हा बीच जरा इतर बीचसारखा गजबजलेला वाटला. समोरच एक मीरा कॅफे नावाचं हॉटेल होतं. तिथं फार सुंदर चहा मिळाला. मग आम्ही संपूर्ण संध्याकाळ तिथंच रेंगाळलो. अंधार पडल्यावर मग पुन्हा कार काढून त्या संपूर्ण कोस्टल रोडनं आम्ही राहत होतो त्या जांपोर बीचपर्यंत चक्कर मारली.
आता त्या गावाचा आकार-उकार मला जरा समजायला लागला होता. पुन्हा सावकाश गाडी चालवत इकडे आलो. मीरा कॅफेमध्येच निवांत जेवलो. तिथं आमच्याशिवाय कोणीही नव्हतं. नंतर एक-दोन फॅमिली आल्या. एवढी असीम शांतता, समोर सुंदर झगमगता रस्ता, तिथं स्केट करणारे, चित्रं काढणारे लोक... काही क्षण एकदम परदेशात आल्यासारखंच वाटलं. एकदम लक्षात आलं, की आपल्याला हवंय ते हे! शांतता... मायेनं थोपटणाऱ्या आईच्या हातासारखी शांतता... जवळच्या माणसाच्या मिठीच्या ऊबेत मनाला लाभते ती असीम शांतता.... आमचं बोलणं, गप्पा, बडबड एकदम कमी कमी होत गेलं... आम्ही ती शांतता स्वत:त मुरवत स्वस्थ बसून राहिलो. त्या बीचवर रस्त्याच्या कडेने फूटपाथ आणि बसायला कठडे केले आहेत. किती तरी वेळ तिथं बसलो. मागून समुद्रावरून येणारं थंडगार वारं, समोर दीपगृहाचे फिरणारे दिवे आणि आकाशात पौर्णिमेचा पूर्ण चंद्र! अहाहा... ते सगळे क्षण मनाच्या कुपीत अत्तरासारखे घट्ट बंद करून ठेवले.
जेवण झाल्यावर सावकाश हॉटेलकडं निघालो... मन समाधानानं, आनंदानं भरून आलं होतं... दुसऱ्या दिवशी इथं आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं.... आता काही बघण्याची असोशी उरली नव्हती की कुठेही घाई-गर्दीत टिकमार्क करत जायचं नव्हतं... दमणनं जे काही द्यायला हवं होतं ते दिलं होतं... 



(पूर्वार्ध)

---

उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

2 comments:

  1. अगदी तपशिलात, सुंदर प्रवास व ठिकाण वर्णन केले आहे. बघू आमचा केव्हा योग येतोय ते...
    👍👌

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. तुमचीही अमेरिका डायरी झकास!

      Delete