9 Dec 2013

काही कविता...

सोळा-अठराच्या वयात तशा बहुतेकांना कविता होतातच.
मलाही झाल्या.
त्यातल्याच या काही... बीस साल बाद...
(टोपणनावानं लिहिण्याची सवय तेव्हापासून... तेव्हाचं अस्मादिक कवींचं होतं आनंदीनंदन..)
---
काही कविता...
-------------

१. ध्येय
---------
मंतरलेले ते दिवस गेले,
आठवणींचे फक्त निर्माल्य उरले,
जीवनातील गेला आनंद सगळा,
आता फक्त मोजणे घटका नि पळा,
आत्मविश्वासाचा हरवला वारू,
जीवनाचे हे भरकटले तारू,
जीवनपथावर लोकांची रहदारी भारी,
आपल्याबरोबर आपली सावली तेवढीच खरी,
बावरून गेलोय मी पुरता इथे,
साथीदारही न उरती संगतीला जिथे,
आता फक्त चालणे एकट्याचे आहे,
सामर्थ्य समोरचा अंधार पेलण्याचे आहे,
त्यासाठी धाडस हवे आहे आता फक्त,
त्यासाठी हवे आहे उसळते गरम रक्त,
तारुण्यातच गरम रक्ताचे उसळणे
पुरते थंडावले आहे,
जीवनातील अनपेक्षित वादळांशी
झेप-झुंजा घेऊन ते थकले आहे,
पुन्हा करायची आहे नवी सुरुवात,
जिद्द आहे परिस्थितीवर करण्याची मात,
त्यासाठी पुरता नाहीये तुझ्या आठवणींचा निवारा,
तर मग प्रत्यक्षच हवीय तुझ्या
सोबतीची जलधारा,
येशील का माझ्याबरोबर हातात हात घेऊन,
समोरच्या दूर डोंगरावरील शिखर
खुणावतेय अजून,
बरोबर! तिथंच तर मला जायचं आहे,
तुझ्याबरोबरच माझ्या ध्येयावरही प्रेम करायचं आहे!!!

- आनंदीनंदन

(१ नोव्हेंबर १९९३, सोमवार, रात्री ११.१५ वा., पुणे)
---

२. शब्दप्रेम
-----------

अर्थहीन शब्दांचे गाढवओझे घेऊन
का आम्ही करतो आहोत प्रवास आमच्या ध्येयाचा,
शब्दांच्या, महाशब्दांच्या थोर कुबड्या
घेऊन मिळणार आहे का आम्हाला
आमचं ध्येय?
शब्दांत खूप सामर्थ्य आहे... माहीत आहे
'शब्द हाचि देव...' तुकोबाच म्हणून गेले आहेत,
पण शब्दांच्या जंजाळात आपले
पाय अडकवून कायमची आपली वाटचाल
नाही का थांबवत आपण?
आम्ही सारे असेच,
शब्दांचे इमले बांधू, शब्दसागरात पोहू,
शब्दांच्या साम्राज्याचे सम्राट बनू,
पण करणार नाही प्रत्यक्ष कृती काहीच!
'शब्द' हे 'कृती'चे सर्वांत मोठे शत्रू आहेत का?
'शब्द' हे मायावी राक्षसच आहेत जणू!
'कृती'च्या राजकुमारीला त्यांनी बंदिस्त
करून टाकलं आहे आपल्या मोहजालात,
आम्ही तरी कसले करंटे!
आम्हाला राजकुमारीची सुटका नकोच आहे,
त्यासाठी हवं तर आम्ही मायावी राक्षसांचे
पाय चेपू, गुणगान गाऊ,
पण इच्छा हीच, त्यांनी राजकुमारीला सोडू नये,
तिकडं इंग्लंड-अमेरिकेत राजकुमारीचं राज्य चालू आहे,
आम्ही मात्र मायावी राक्षसांचेच आयुष्यभराचे दास,
का आम्ही आहोत याबाबतीत इतके उदास?

- आनंदीनंदन

(१ नोव्हेंबर १९९३, सोमवार, रात्री ११.२५ वा., पुणे)
----

३. मन
-------
मन मोठी विचित्र गोष्ट आहे,
म्हटला तर आरसा आहे,
म्हटलं तर हवी ती गोष्ट लपवायची
चांगली गुप्त पेटी आहे,
जेव्हा आपण क्वचित कधी तरी
एखादी चांगली गोष्ट करतो,
मनाचा आरसा लगेच चारचौघांत
तेच ते सांगण्यासाठी 'रिफ्लेक्ट' होतो,
जेव्हा म्हणजे बऱ्याचदा आपण
अशा गोष्टी करतो,
की तेव्हा ह्या आरशाने न चमकणेच
चांगले असते,
आटोकाट प्रयत्न करतो आपण,
आपले दोन्ही तळवे आरशावर
झाकून तो पुरता झाकेल याची
काळजी घेत,
पण काही आगाऊ प्रकाशकिरण
निसटतातच त्यातून,
आणि धडकतात समोरच्याच्या आरशावर,
तो विचारतो, 'काय रे, अस्वस्थ
दिसतोयस? काय झालं?'
काय सांगणार कप्पाळ?
प्रकाशकिरण सगळे, ऐकत नाहीत आपलं,
तेव्हा वाटतं,
आरसा नसावंच मन,
असावी ती छानशी, लोखंडाची गुप्त पेटी,
की ज्यात आपण
अशा गोष्टी टाकतो, की ज्या
आयुष्यभर विसरणं आपल्याला
मुळीच नसतं शक्य!!

- आनंदीनंदन
(१ नोव्हेंबर १९९३, सोमवार, रात्री ११.३० वा., पुणे
----

No comments:

Post a Comment