30 Nov 2023

हंपी डायरी - भाग १

पाषाणशिल्पांच्या दुनियेत...
----------------------------------


हंपीला जायचं माझं स्वप्न अखेर पूर्ण झालं. साधारण २०१९ मध्ये आपल्याकडचे अनेक जण हंपीला जाऊन तिथले फोटो टाकताना पाहिले, तेव्हा मी फेसबुकवर ‘मी हंपीला अजून गेलेलो नाही, हा समाज मला माफ करणार का?’ अशा आशयाची पोस्टही टाकल्याचं आठवतं. त्यानंतरची दोन-तीन वर्षं ‘कोव्हिड’मध्येच गेली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हंपीला जायचं नक्की झालं. मी, धनश्री आणि सोबत माझा धाकटा आतेभाऊ साईनाथ व त्याची पत्नी वृषाली असणार होती. अगदी तिकडचं बुकिंगही झालं. मात्र, तेव्हा बेळगावला सीमाप्रश्न पेटल्यानं वातावरण बिघडलं. आम्हाला आमची कार घेऊन जायचं असल्यानं आम्ही जरा घाबरून तिकडं जायचं रद्दच करून टाकलं आणि बरोबर उलट्या दिशेला म्हणजे, दमणला जाऊन आलो. मात्र, तेव्हाच पुढच्या वर्षी हंपी नक्की करायचं, हे ठरवून टाकलं. यंदा भावानं नवी नेक्सॉन कारही घेतली होती. त्यामुळं जाताना त्या कारनंच जायचं हेही आम्ही पक्कं ठरवलं होतं. त्यानुसार २५ ते २८ नोव्हेंबर असे चार दिवस ही ट्रिप केली. ट्रिप खूप छान झाली. मजा आली. हंपीत दोन दिवस कमीच पडले, असं वाटलं. शिवाय आम्हाला वेळेअभावी बदामी व पट्टदकल वगैरे काही बघता आलं नाही. त्यासाठी हंपीची आणखी एक ट्रिप नक्की करणार!
आम्ही शनिवारी सकाळी साडेसहा वाजता पुण्याहून निघालो. आम्हाला ‘गुगल मॅप’वर सोलापूर, विजापूर (आता विजयपुरा) मार्गे रस्ता सुचवण्यात आला होता. मात्र, बेळगाववरूनच जायचं हे आम्ही ठरवलं होतं. मी बेळगावला शेवटचा १९९९ मध्ये साहित्य संमेलनाच्या कव्हरेजसाठी गेलो होतो. त्यानंतर अगदी याच वर्षी एप्रिलमध्ये गोव्याहून ट्रेननं येताना संध्याकाळी थोडा वेळ ट्रेनच्या दारातून बेळगावचं ओझरतं दर्शन झालं होतं. यंदाही आम्ही बेळगावात थांबणार नव्हतोच; पण तरी जाताना बेळगाव, हुबळी-धारवाडवरूनच जायचं हे आम्ही ठरवलं होतं. सकाळी दहा वाजता कऱ्हाडला पोचलो. ‘संगम’ला ब्रेकफास्ट केला. कऱ्हाडमध्ये उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. त्यामुळं तिथं सध्या ट्रॅफिक जॅम होत असतो. मात्र, आम्ही सुदैवानं न अडकता बाहेर पडलो. कोल्हापूर, कागल ओलांडून आम्ही बाराच्या आसपास कर्नाटकात प्रवेश केला. कोगनोळी नाका ही दोन्ही राज्यांची सीमा. (खरं तर बेळगाव, निपाणी, संकेश्वर ही सगळी गावं आपलीच. त्यामुळं ही सीमा असं म्हणवत नाही. पण असो.) साधारण दीडच्या सुमारास आम्ही बेळगावात पोचलो. त्याआधी वंटमुरी हे गाव लागलं. मला एकदम ‘वंटमुरीकर देसाई त्यांचा बोका’ आठवून हसायला आलं. बेळगावचं सगळं असोसिएशन ‘लंपन’मुळं आहे. इंदिरा संत हे आणखी एक कारण. शिवाय पुलंचे ‘रावसाहेब’ आहेतच. बेळगावात पोचताना आम्ही ‘रावसाहेब’ ऐकणार नाही, हे शक्यच नव्हतं. मनसोक्त हसतच आम्ही बेळगावात प्रवेश केला. खरं तर बायपासवरून आम्ही पुढं गेलो. हल्ली सर्व महामार्गांवर बायपास झाले आहेत. ते गर्दी टाळण्याच्या दृष्टीनं सोयीचे असले, तरी त्यामुळं त्या त्या गावाचा फील घेता येत नाही. आमचंही तेच झालं. या वेळी बेळगावमध्ये कर्नाटक सरकारनं बांधलेलं उंच टेकाडावरचं ते विधान सौध मात्र बघता आलं. मराठी लोकांच्या नाकावर टिच्चून बांधलेलं असलं तरी आहे मात्र भव्य व देखणं! असो.
बेळगाव ओलांडलं. या भागात रस्त्याने मी प्रथमच जात होतो. हुबळी-धारवाडकडे निघालो होतो. हा एके काळी सगळा मुंबई इलाख्यातला भाग. तिकडं अजूनही याला ‘बॉम्बे कर्नाटक’ असंच म्हणतात. खरं तर माझं कुणीही नातेवाइक तिकडं नाही, ना माझा कुठला सांस्कृतिक-भावनिक धागा तिकडं जोडलेला आहे! पण का कोण जाणे, या भागाविषयी आपुलकी वाटते. आम्ही थोडं पुढं गेल्यावर रस्त्यातच एका हॉटेलमध्ये जेवलो. साधंसं हॉटेल, पण स्वच्छ. जेवणही चांगलं होतं. भूक लागलीच होती. जेवून पुढं निघाल्यावर आता गाडी मी चालवायला घेतली. सकाळपासून साईनाथच ड्राइव्ह करत होता. आता त्याला जरा विश्रांती द्यायला हवी होती. आता आम्ही पुढं धारवाडकडं निघालो. या सगळ्या परिसराविषयी कितीदा काय काय वाचलेलं... धारवाडविषयीची आपुलकी जी. ए. कुलकर्णींमुळं असणार. बाकी पुलंच्या लेखनात इकडचे बरेच उल्लेख येतात. मग ते मल्लिकार्जुन मन्सूर असतील, भीमसेन जोशी असतील, गंगूबाई हनगल असतील... ही सर्व मंडळी याच भागातील. उत्तर कर्नाटक हा नैसर्गिकरीत्या तसा दुष्काळी भाग. मात्र, गुणवान कलाकार मंडळींचीही खाणच. धारवाड आधी लागलं. पण पुन्हा तेच. बायपासनं पुढं निघालो. गावाचा फील नाहीच लाभला. डावीकडं लांबवर दिसणाऱ्या त्या छोटेखानी शहराकडं बघत, मनातल्या मनात जीएंच्या स्मृतींना वंदन केलं. त्यात मी अलीकडं गिरीश कार्नाडांचं आत्मचरित्र वाचलं, त्यात धारवाडच्या फार सुंदर आठवणी त्यांनी लिहिल्या आहेत. सारस्वतांच्या त्या कॉलनीचं ते टेकाड बघायची फार इच्छा होती, पण नाइलाज होता. धारवाड ते हुबळी हा रस्ता अजूनही दोन लेनचाच आहे. आता तो चौपदरी करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळं तिथं सतत कोंडी होत होती. आम्ही थोड्याच वेळात हुबळीला पोचलो. धारवाड-हुबळी ही तशी जोड-शहरंच. आपल्या पुणे व पिंपरी-चिंचवडसारखी. ही उत्तर कर्नाटकातील प्रमुख सांस्कृतिक केंद्रं. मला एकदा तिथं नीट राहून, शांतपणे चालत हिंडून ती गावं बघायची आहेत. पण या वेळेला निदान त्या गावांवरून जाता आलं, हेही नसे थोडके. हुबळी शहर डावीकडं ठेवून आम्ही पुढं निघालो. इथं आपण पुणे-बेंगळुरू महामार्ग सोडतो आणि डावीकडे गदग, कोप्पलकडे वळतो. हाच रस्ता पुढं होस्पेट, रायचूरकडे जातो. (पुढं आंध्रात...) इथं आमची थोडी गडबड झाली. आम्ही थोडं पुढं गेलो. मात्र, लगेच रस्ता सापडला आणि वळून आम्ही योग्य मार्गाला लागलो. हा रस्ता आता सिमेंटचा आणि चार पदरी, सुंदर झाला आहे. कर्नाटकातले बहुतेक महामार्ग, मोठे रस्ते आता चांगले, प्रशस्त आहेत. आम्ही थोड्याच वेळात गदगला पोचलो. इथेच भीमसेन जोशी जन्मले. गाव डावीकडे आणि आम्ही बायपासवरून पुढे. पुन्हा एकदा मनातल्या मनातच अण्णांच्या स्मृतींना वंदन केलं.
आता संध्याकाळ व्हायला लागली होती. आम्ही सकाळपासून प्रवास करत होतो. कोप्पल ओलांडलं. खरं तर मी हंपीला निघालोय म्हटल्यावर आमचे मित्रवर्य किरण यज्ञोपवीत यांचा फोन आलाच होता. मागच्या वर्षीही आम्ही निघणार म्हटल्यावर किरणनं बऱ्याच टिप्स दिल्या होत्या. आताही त्यानं फोन करून कोप्पलला चांगली मंदिरं आहेत अशी माहिती दिली. मात्र, आमच्या वेळेत ते बसणार नव्हतं. कोप्पल सोडून आम्ही पुढं निघालो.आता होस्पेट जवळ आलं होतं. मात्र, पाच वाजल्यामुळं चहाचा ब्रेक गरजेचा होता. एक टपरी बघून थांबलो. तिथं एक जोडपं ते छोटेखानी हॉटेल चालवत होतं. त्यातल्या बाईला हिंदी कळत नव्हतं. मात्र, ती सफाईदार इंग्लिश बोलत होती. तिनं आम्हाला तिथली स्पेशालिटी असलेली ढोबळी मिरची घातलेली मसाला भजी घेण्याचा आग्रह केला. आम्ही एक प्लेट घेतली. ती गरमागरम आणि तिखट भजी भलतीच चवीष्ट, झणझणीत होती. मजा आली. नंतर मोठा कप भरून चहा घेणं आवश्यकच होतं. तिथून निघालो. पुढं एक फ्लायओव्हर लागला. डावीकडं जाणारा रस्ता विजापूरकडून येत असावा, असं मी साईनाथला म्हटलं. (नंतर परतीच्या प्रवासात माझा अंदाज बरोबर ठरला.) तिथं एक टोलनाका होता. तो पार केल्यावर होस्पेट आलंच. तोवर अंधार पडला होता. होस्पेट हे एक मध्यम आकाराचं शहर असल्याचं दिसलं. साधारण आपल्याकडच्या साताऱ्यासारखं! गुगल मॅप लावून दहा मिनिटांत आमचं हॉटेल शोधलं. हे हॉटेल साईनाथनं बुक केलं होतं. ते कसं असेल याची धाकधूक होती. मात्र, गावाच्या मध्यवर्ती रस्त्यावर आणि चार-पाच मजली हे प्रशस्त हॉटेल, खाली गजबजलेलं रेस्टॉरंट, पार्किंगमधल्या कारची विपुल संख्या (त्यात भरपूर ‘एमएच-१२’ होत्या, हे सांगणे न लगे...) बघून ‘हुश्श’ वाटलं. एखाद्या गावातलं, जुनं, प्रतिष्ठित असं एखादं हॉटेल असतं, तसं हे ‘प्रियदर्शिनी पार्क’ वाटलं. रिसेप्शनला बुकिंग दाखवून लगेच रूम ताब्यात घेतल्या. अत्याधुनिक सोयी असलेल्या, स्वच्छ रूम बघूनच फार बरं वाटलं. चौथ्या मजल्यावरच्या आमच्या रूमला गावाच्या दिशेनं उघडणारी बाल्कनी होती. तिथून सर्व शहराचा नजारा छान दिसत होता. लांबवर छोटेखानी टेकड्या दिसत होत्या. तेच हंपी असावं, असं मनातल्या मनात नोंदवून ठेवलं.
मागच्या वर्षी आमचं हंपीला जायचं ठरलं, तेव्हा गौरी लागूंच्या कन्येनं - मेघानं - मला तिथल्या मंजू नावाच्या गाइडचा नंबर दिला होता. तो माझ्याकडं होता. किरणनं आमच्यासाठी ज्या गाइडला फोन केला होता, तो बिझी होता. मग आमचं रात्रीचं जेवण झाल्यावर मी या मंजूला फोन केला. सुदैवानं तो दुसऱ्या दिवशी उपलब्ध होता. ‘आपण गाइड नसून, रिक्षाची सेवा देतो,’ हेही त्यानं प्रामाणिकपणे सांगितलं. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता भेटायचं ठरवलं. तो आमच्या हॉटेलवर येणार होता. आम्हीही दिवसभराच्या प्रवासानं दमलो होतोच.

विजयनगरच्या साम्राज्यात...

सकाळी आवरून खाली असलेल्या ‘नैवेद्यम्’ या आमच्या हॉटेलच्याच रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्टला गेलो. रविवार असल्यानं भरपूर गर्दी होती. निम्मे-अर्धे लोक मराठी होते. पहिल्या दिवशी टिपिकल इडली-वडा, उत्तप्पा, डोसा असा ठरलेला नाश्ता झाला. साडेसाठ वाजता मंजूबाबा आला. त्याच्याशी डील केलं. दोन दिवसांचे चौघांना रिक्षाने फिरवण्याचे पाच हजार रुपये ठरले. आम्ही लगेच बाहेर पडलो. त्यानं आधी कमलापूर गाव ओलांडून अनेगुंदीच्या दिशेनं नेलं. जाताना उजव्या बाजूला कमलापूरचा सुंदर, मोठा तलाव दिसतो. डावीकडं थोडं खालच्या बाजूला केळीची शेती, नारळाची झाडं असं सुंदर दृश्य दिसतं. मंजू आम्हाला कमलापूरच्याही पुढं घेऊन गेला. तिथं माल्यवंत रघुनाथाचं मंदिर आहे. ते आधी पाहिलं. पहिल्याच मंदिराच्या दर्शनानं आम्ही अवाक झालो. छोट्याशा टेकडीवर असलेल्या त्या परिसरात सर्वत्र प्रचंड मोठ्या शिळा पडल्या होत्या. त्यातले काही महापाषाण तर कधीही पडतील, अशा बेतात एकमेकांवर रेलून बसले होते. गुरुत्वाकर्षणाला पराजित करणारं असं कोणतं आकर्षण त्या शिळांना एकमेकांशी धरून ठेवत असेल, असं वाटून फारच आश्चर्यचकित व्हायला झालं. त्या मंदिराच्या शेजारी असलेल्या एका मंडपात नाच-गाण्याचे कार्यक्रम व्हायचे. तिथल्या खांबा-खांबांवर नृत्याच्या विविध पोझेस असलेल्या शिल्पाकृती कोरलेल्या होत्या. सध्या इथं अगदी मोठा समारंभ न परवडणाऱ्या लोकांचे विवाह समारंभही होतात, अशी माहिती मंजूबाबानं दिली. नंतर तो आम्हाला मंदिराच्या मागच्या बाजूला घेऊन गेला. तिथं एक प्रचंड पाषाण आडवा पडला होता. आम्ही तिथं भरपूर फोटो काढले. ‘या ठिकाणी मी फक्त माझे ग्राहकच घेऊन येतो,’ असं मंजूबाबा अभिमानानं सांगत होता. त्या परिसरात पडलेल्या प्रचंड शिळा, त्यांचे वेगवेगळे आकार पाहून आपण वेगळ्याच दुनियेत आल्याचा भास होत होता. 

विजयनगरचं साम्राज्य आणि हंपीतलं त्यांचं वैभव याविषयी भरपूर लिहिलं, बोललं गेलं आहे. ते आपल्यापैकी बहुतेकांना ठाऊक आहे. मलाही ही सगळी ऐकीव माहिती होती. मात्र, प्रत्यक्ष तिथं जाऊन हे सगळं अनुभवणं ही फारच निराळी गोष्ट होती. त्या हवेचा परिमळ, तिथल्या पाषाणाचा थंडगार स्पर्श, तिथल्या पाण्याची चव आणि तिथल्या आसमंतात ऐकू येत असलेल्या कित्येक थक्क करणाऱ्या लोककथा, दंतकथा यांच्या अजब मिश्रणातून जे अनुभवायला येतं, ते हंपी विलक्षण आहे. माल्यवंत रघुनाथाच्या मंदिरातून पूजापाठाचा घोष ऐकू येत होता. मंजूबाबानं सांगितलं, की १७-१८ वर्षांपासून काही साधूमंडळी इथं अखंड पूजापाठ करत आहेत. अजूनही त्यांचा तो कार्यक्रम संपलेला नाही. आपण सहस्रावर्तन करतो किंवा हरिनाम सप्ताहात जशी ती वीणा खाली न ठेवता अखंड वाजविली जाते, तसंच इथं काही साधू आलटून-पालटून हे मंत्रघोष सतत करत असतात. त्या तिथे जाण्यापूर्वी वर आणखी एक शिवाचं छोटंसं मंदिर होतं. तिथला तरुण पुजारी मला दोन-दोनदा हाक मारून बोलवत होता. कुणी तरी खेचून नेल्याप्रमाणं मी एकटाच तिथं गेलो. आपल्या शंकर या देवाला असंच कुठं कुठं उंचावर, कडेकपाऱ्यांत, दरीखोऱ्यात राहायला फार आवडतं. मला शान्ताबाईंचं ‘भस्मविलेपित रूप साजिरे’ हे अप्रतिम गाणं आठवायला लागलं. मी त्या छोटेखानी मंदिरात गेलो. त्या तरुण पुजारी पोरानं माझ्या हातून अभिषेक करविला, कपाळी भस्म लावलं. मीही मंत्रभारित झाल्यागत सगळं आपोआप केलं. पूजा झाल्यावर भानावर आलो. पुजारी मुलगा मोठ्या अपेक्षेनं पाहत होता. मलाही ते लक्षात आलं. मी अगदी सहज ‘जी-पे’ आहे का विचारलं. खरं तर तिथं जी-पेचा स्कॅनर होताही; पण तो बंद होता. त्यामुळं मी रोख पैसेच दक्षिणा म्हणून द्यावेत असं त्याचं म्हणणं पडलं. हल्ली माझ्या खिशात फार रोकड नसते. लागत नाही. खिशात एक पन्नासची नोट होती. बाकी पाचशेच्या होत्या. त्यामुळं नाइलाजानं मला शंभर रुपये द्यायचे असूनही मी ते पन्नास रुपये त्याच्या हातावर टेकवले आणि निघालो. तरुण पुजारी मुलगा तेवढ्यावरही समाधानी दिसला. ‘आम्हाला दुसरं उत्पन्नाचं साधन नाही, लोक जे देतील ते’ असं काहीसं तो पुटपुटत होता. मला तेव्हा नक्की काय वाटलं ते सांगता येत नाही. मात्र, आपण निदान शंभर रुपये द्यायला हवे होते, असं वाटून गेलं. (हा असा अनुभव हंपीत एकदाच आला. पहिला आणि शेवटचा.)
धनश्री, साईनाथ व वृषाली केव्हाच खालच्या रघुनाथ मंदिरात गेले होते. मी जरा गडबडीतच ते टेकाड उतरून त्या मंदिरात गेलो. तिथंही शेजारी एक लक्ष्मीचं मंदिर होतं. तिथलाही पुजारी बोलवत होता. मात्र, आता मी तिकडं दुर्लक्ष करून मुख्य मंदिरात शिरलो. हे चांगलं, जितंजागतं, नांदतं मंदिर होतं. इथंच त्या सभामंडपात ते दोन साधू पूजापाठ करत होते. मी आपला तिथं जाऊन एक नमस्कार ठोकला. मला त्या बाबानं हातावर तीर्थ दिलं. ताटलीतल्या दक्षिणेच्या पैशांकडं हात दाखवला. मात्र, तो तोंडानं मंत्रजप करत असल्याचा फायदा घेऊन मी पुन्हा एक नमस्कार ठोकला आणि तिथून निघालो. या तिघांनीही तिथं पैसे आधीच दिले होते. बाहेर येऊन फोटो काढले. मंदिराच्या बाहेर दोन कार लागल्या होत्या. त्यातली एक महाराष्ट्रातील होती. आजूबाजूला माकडं उड्या मारत होती. हंपीत सर्वत्र विपुल संख्येनं माकडं आहेत. त्यांना सतत खायला लागतं. हातात खाण्याची कुठलीही वस्तू घेऊन तुम्ही मोकळेपणाने फिरू शकत नाही. माकडांनी त्यावर डल्ला मारलाच म्हणून समजा. 
इथून आता मंजूनं त्याची रिक्षा हंपीतल्या दोन प्रमुख ठिकाणांपैकी एक असलेल्या विठ्ठल मंदिराच्या दिशेनं घेतली. इथं मुख्य मंदिरापासून साधारण एक किलोमीटर अंतरापर्यंतच वाहनं नेता येतात. तिथं पार्किंगचा प्रशस्त तळ आहे. तिथून एक तर तुम्ही चालत जाऊ शकता किंवा बॅटरी ऑपरेटेड वाहनांतून जाऊ शकता. आम्हाला उन्हात चालायचं नव्हतं म्हणून आम्ही त्या बॅटरी गाड्यांसाठीची रांग धरली. वीस रुपये तिकीट होतं. त्या रांगेत शिरण्याआधी वॉशरूमकडे धाव घेतली. तिथं पाणीच नव्हतं. बाहेर पिण्याच्या पाण्याचे नळ होते. तिथेही खडखडाट. बाहेर ज्यूस, फळं, उसाचा रस विकणाऱ्या गाड्या होत्या. आम्हाला तहान तहान होत होती. मग उसाचा रस प्यायलो. नंतर रांगेत उभे असतानाही सतत कलिंगडाच्या फोडी, अननसाच्या फोडी, ताक विकायला पोरं येत होती. त्या फोडी एवढ्या रसरशीत होत्या, की त्या घेऊन खायचा मोह आवरला नाही. साधारण २०-२५ मिनिटांनी आमचा नंबर लागला. या बॅटरी गाड्या कॉलेजमधल्या मुलींना चालवायला दिल्या आहेत. इथून पुढचा सगळा रस्ता मातीचा होता. त्यामुळं असेल, पण त्या मुलीनं तोंडाला रुमाल लावला होता. आम्ही दहा मिनिटांत विठ्ठल मंदिराच्या दारात पोचलो. इथं पुन्हा तिकिटांची रांग होती. इथं घेतलेलं तिकीट आणखी दोन-तीन ठिकाणी चालतं. त्यामुळं ते जपून ठेवावं. साठ रुपये तिकीट आहे. इथं गाइड घ्यावा, असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. मंजूच्या मते, गाइड विठ्ठल मंदिराचा संपूर्ण परिसर दाखवण्यास २०० ते ३०० रुपये घेतो. आम्ही ४०० रुपयेही द्यायला तयार होतो. मात्र, इथले गाइड ८०० रुपयांच्या खाली यायला तयार होईनात. गर्दीही प्रचंड होती. फारसे गाइड मुळात उपलब्धच नव्हते. आमच्याकडे अश्विनीनं (मित्र मंदार कुलकर्णीची पत्नी) दिलेलं आशुतोष बापट यांचं ‘सफर हंपी बदामीची’ हे उत्कृष्ट पुस्तक होतं. मग तेच गाइड म्हणून वापरायचं ठरवून आम्ही आत शिरलो. समोर विलक्षण, अद्भुत आणि थक्क करून टाकणारं, असामान्य असं काही तरी आमची वाट बघत होतं....



(क्रमश:)

----------

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

------

4 comments:

  1. (Continue fast please) आम्हालाही हंपी सहलीसाठी उपयुक्त ठरणार.

    ReplyDelete
  2. छान सफल सफर हंपीची

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद उमेशजी... पुढचा भागही वाचा...

      Delete