23 Nov 2023

पासवर्ड दिवाळी २३ - कुमारकथा

सेल्फी... सेल्फी(श)... सेल्फी...
----------------------------------

एक होतं जंगल... जंगलात नव्हतं काहीच मंगल...
झाडं दु:खी, प्राणी दु:खी, नदी दु:खी, नद्यांमधले मासेही दु:खी....
खरं तर एके काळी हे जंगल किती आनंदात असायचं! झाडं खूश असायची, प्राणी आनंदात उड्या मारत असायचे, नदी हसत-खळाळत वाहत असायची... मासेही मजेत पोहत असायचे. पाऊस पडला, की जंगल कसं हिरवंगार होऊन जायचं. उंचच उंच गवत उगवून यायचं. त्यातून हत्तीदादांचं कुटुंब मोठ्या डौलानं, दमदार पावलं टाकीत पाण्याकडं चालत जायचे. हरणांचे कळप उड्या मारत इकडून तिकडं हुंदडत असायचे... कोल्होबा, लांडगेभाऊ, तरसतात्या, अस्वलमामा, गेंडेदादा सगळेच एकदम मस्त खेळायचे अन् लोळायचेही.
पण अलीकडं काही वर्षांत हे चित्र बदललं की हो! जंगल पूर्वीसारखं राहिलं नाही. उदास उदास राहू लागलं. मनातल्या मनात कुढू लागलं. सगळेच झाले दु:खी... सगळेच झाले कष्टी...
का विचारा... अहो, या जंगलात माणसं येत असत रोज... भटकत असत इतस्तत: सतत... त्यांना ना काळ ना वेळ... सतत हसणं अन् खिदळणं... सोबत त्यांची ती रंगीत चौकोनी डबी... तो फोन... स्मार्टफोन म्हणे... प्रत्येकाच्या हातात फोन आणि प्रत्येकाचा वेगळाच टोन... सतत माणसं आपली सेल्फी काढताहेत... धबधबा म्हणू नका, पायवाटा म्हणू नका, दगड म्हणू नका की धोंडा म्हणू नका...! प्रत्येकावर यांच्या नावाचा शिक्का उमटलाच पाहिजे, प्रत्येक ठिकाणावर यांची सेल्फी निघालीच पाहिजे... जंगलातलं एक झाड यांनी सोडलं नाही, की एक वेल सोडली नाही! सगळीकडं सेल्फीचाच पूर आला... हल्ली तर कहरच झाला... माणसांच्या टोळ्या झाल्या... टोळ्यांमागून टोळ्या... सगळेच हातात बाटल्या घेऊन नाचत आहेत, सगळेच कसल्याशा धुंदीत लहरत आहेत... त्यांच्या त्या कर्णकर्कश आवाजांतील गाण्यांनी आणि धांगडधिंगाण्याने जंगलाचे कान किटले. अति झाले...

सारे जंगल वैतागले. प्राणी सगळे वैतागले.... हत्तीदादाकडे गेले... झाडे सगळी त्रस्त झाली... वडआजोबांकडे गेली. प्राणी म्हणाले, ‘हत्तीदादा, हत्तीदादा... या माणसांच्या टोळीचा बंदोबस्त करा. यांच्या फोटोंचा धुमाकूळ थांबवा.’ झाडे म्हणाली, ‘वडआजोबा, वडआजोबा... या माणसांच्या टोळ्या आवरा. तुमच्या पारंब्यांची बेडी अडकवून सगळ्यांना धरून बांधून टाका...’
हत्तीदादा विचारात पडले. वडआजोबांकडे गेले. दोघांनी मिळून विचार केला. माणसांच्या फोटोच्या कटकटीला कसे दूर करावे? कसे बरे? माणसांची गर्दी कशी हटवावी? कशी बरं कशी? त्यांनी प्राण्यांची आणि झाडांची बोलावली सभा... पौर्णिमेच्या रात्री सगळं जंगल सभेला जमलं. वडआजोबा अध्यक्षस्थानी होते, तर हत्तीदादा प्रमुख वक्ते. हत्तीदादा म्हणाले, ‘मित्र हो, आपलं हे जंगल, आता नाही राहिलं मंगल... याचं कारण माणूस आणि त्याच्या हातातली ती चौकोनी चमकती डबी. त्या डबड्यापायी आपल्या जंगलाची लागली वाट... आता करावाच लागेल उपाय खास!’
सगळे म्हणाले, ‘हो, हो... करा, करा. आम्हाला पण खूप त्रास होतो. माणसं घोळक्यानं येतात. आवाज करतात... त्यांच्या त्या चौकोनी डब्यातून सतत खटखट करत बसतात... नुसती कटकट! माणसांच्या या गोंधळाचा वैताग आलाय आम्हाला...’
सगळे वडआजोबांकडे बघायला लागले. त्यांच्या पारंब्या शालीसारख्या त्यांनी अंगावर लपेटून घेतल्या आणि जरासं खाकरून ते बोलू लागले, ‘तुमचं म्हणणं खरं आहे. मी गेली शंभर वर्षं तरी या जंगलात राहतोय. आधी इथं असं नव्हतं. माणसं फार कमी यायची इकडं... उलट सगळे प्राणी मस्त खेळायचे आजूबाजूला... झाडंही पावसात हिरवीगार होऊन छान डोलत असायची... पण गेल्या २०-२५ वर्षांत सगळं बदललं. माणसं एकाएकी मोठ्या संख्येनं जंगलात यायला लागली. त्यांच्या गाड्यांचे आवाज होऊ लागले. त्या गाड्या धूर सोडू लागल्या. काही माणसं तर बंदुका घेऊन यायला लागली. त्यांनी आपले प्राणी मारायला सुरुवात केली. अलीकडं तर ते सगळे ती चौकोनी चमकदार रंगीत डबी घेऊन येतात आणि त्यातच बघत बसतात... आपल्याला होणारा त्रास असह्य झाला आहे. यावर आता एकच उपाय - माणसं आपल्याकडं जातात, तसं आपण माणसांकडं फिरायला जायला सुरुवात करायची... मान्य आहे?’
सभेत एकच गदारोळ उडाला. हा उपाय आहे? असं कसं शक्य आहे? माणसं आपल्याला जिवंत सोडतील? किती भयानक, क्रूर असतात माणसं! कसं जमणार हे? सगळे प्राणी, झाडं एकदम गलका करू लागले. माणसांकडे जाण्याची कल्पना अनेकांना फार भारी वाटत होती, तर काहींना त्यात अतोनात धोका जाणवत होता. काय करावं? कसं करावं? सगळ्यांचा एकच गोंधळ सुरू झाला. तितक्याच बिबटेराव पुढे झाले. म्हणाले, ‘वडआजोबा, तुमचं म्हणणं आम्हाला एकदम मान्य आहे. आम्ही जाऊ आधी माणसांच्या शहरांत फिरायला...’ यावर वानरकाका पुढं झाले आणि प्रौढपणानं म्हणाले, ‘तुमचं काय कौतुक हो? आम्ही तर आधीपासून जातोय माणसांकडं... त्यातली काही लोकं आमच्याहून अधिक आचरटपणा करतात ते सोडा...’
सगळे हसले. कोल्होबा पुढं आले. शहाजोगपणे म्हणाले, ‘मी या तरसतात्याला घेऊन जातो कसा माणसांच्या वस्तीत...’ हरणांचे टोळीप्रमुख आले आणि म्हणाले, ‘आम्ही सगळे एकदम जाऊ आणि त्यांच्या शेतात घुसू...’ हे ऐकून झाडांनी आपल्या फांद्या एकमेकांवर आपटून जोरजोरात टाळ्या वाजवल्या... ससोबा उड्या मारू लागले, अस्वलमामांनी जोरजोरात छाती पिटायला सुरुवात केली, हरणं कळपासह टणाटण उड्या मारू लागली.... सगळीकडं एकदम आनंदीआनंद झाला. अवघं जंगल खूश झालं!
वडआजोबांनी सगळा प्लॅन नीट समजावून सांगितला. सगळं ठरलं. माणसांच्या वस्तीवर हल्लाबोल करायचा...
माणसांनी आपल्याला आत्तापर्यंत बराच त्रास दिला. सगळ्या जंगलात येऊन ऊतमात केला. वाट्टेल तसं वागले. सगळ्यांची शांतता घालवून टाकली. झाडांना दु:ख दिलं, नदीला रडायला लावलं, प्राण्यांना वेदना दिल्या, पक्ष्यांना छळलं... आता या सगळ्या गोष्टींचा बदला घेण्याची वेळ आली होती. आता जंगल माणसांना मुळीच माफ करणार नव्हतं. त्यांना चांगलाच धडा शिकवणार होतं... आता फार गंमत येणार होती!
सुरुवातीला आपले बिबटेराव आणि त्यांचे मित्र चालून गेले. आधी गावांबाहेरच्या वस्तीत, मग उसाच्या शेतात... मग गावातल्या घरांत, मग एकदम मोठ्या शहरांत, त्यांच्या सोसासट्यांत, बंगल्यांत... बिबटे सगळीकडं शिरले... मग हळूहळू धिप्पाड बांध्याचे गवेही त्यांच्यामागोमाग गेले. गव्यांना अडवणार कोण? ते सुखेनैव शहरांच्या रस्त्यांवरून फिरू लागले. मग हरणांचा कळप घुसला... टणाटण उड्या मारत गावागावांमधून फिरू लागला. शेतात घुसू लागला, वस्त्तीत शिरू लागला. सगळीकडं गोंधळ उडाला.... एकदम हलकल्लोळ उडाला. माणसं बावचळून गेली. घाबरून गेली. त्यांना काय करावं ते सुचेना. जंगल कसं आवरावं, ते कळेना. जंगलातील वडआजोबा लांबून हे सगळं बघत होते... आता माणसं चांगलाच धडा शिकतील, असं त्यांना वाटू लागलं. माणसांना बरी अद्दल घडली, असं सगळ्यांना वाटू लागलं...
तेवढ्यात एक अजब दृश्य त्यांना दिसलं... त्या चौकोनी डब्या घेऊन शेकडो माणसं पिंजऱ्यात बंद केलेल्या  बिबट्यांच्या मागे धावत होती. माणसं मोठी चतुर! त्यांनी कसल्याशा बंदुकीतून डार्ट मारून बिबटेमंडळींना पाडलं बेशुद्ध... आणि घातलं एका मोठ्या गाडीत! ती गाडी निघाली कुठं तरी... मग काय, सगळी माणसं आता त्या बिबट्यांच्या मागं मागं धावू लागली. सगळ्यांना त्या बिबट्यांसोबत सेल्फी काढायचा होता... ते बघून वडआजोबांनी कपाळाला हात लावला. करायला गेलो काय आणि झालं काय हे भलतंच, असं त्यांना होऊन गेलं.
तेवढ्यात एक कोल्होबा त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, ‘आजोबा, हे बघा, मी काय आणलंय?’ वडआजोबांनी बघितलं, तर ती चमकदार चौकोनी डबी... ससोबा म्हणाले, ‘आजोबा, हा स्मार्टफोन आहे. मी माणसांकडून पळवून आणला आहे.... आता तुमच्याबरोबर मला सेल्फी काढायचा आहे...’ वडआजोबांना काय बोलेना, हेच समजेना. त्यांनी रागारागाने आपल्या पारंब्या आपटल्या. कोल्होबांना त्याचे काही नव्हते. त्यांनी ऐटीत सेल्फी काढला आणि ते तिथून निघाले.
हळूहळू सगळ्या जंगलात कोल्होबांनी सेल्फी काढायचा सपाटा लावला. तिकडं माणसं शहरांत बिबट्यांसोबत सेल्फी काढू लागली आणि कोल्होबा जंगलात झाडांसोबत सेल्फी काढू लागले... जंगल मंगल झाले! सेल्फीत दंग दंग झाले...

---

(पूर्वप्रसिद्धी : पासवर्ड दिवाळी अंक (युनिक फीचर्स), २०२३)

---

No comments:

Post a Comment