31 Jan 2021

बिंगोस्कोप - भाग १९ ते २१

बिंगोस्कोप

-------------

स्वाती यादवाडकर या मैत्रिणीनं दोन-तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘बिंगोकिड्स’ या लहान मुलांच्या पाक्षिकात मी ‘बिंगोस्कोप’ या सदरात जगभरातील काही उत्तम चित्रपटांची ओळख मुलांना करून दिली. ही रूढार्थाने परीक्षणं नाहीत. साधारण दहा ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी, त्यांना समजेल अशा साध्या-सोप्या भाषेत सिनेमांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. एकूण २१ सिनेमांवर मी या सदरात लिहिलं आहे. हे लिखाण इथं एकत्रित राहील म्हणून तीन-तीन परिचय एकत्र करून एक ब्लॉग अशा रीतीनं प्रसिद्ध करीत आहे. हा सातवा व शेवटचा भाग...

----


१९. हरिश्चंद्राची फॅक्टरी
-----------------------------

हलत्या चित्रांची अद्भुतरम्य सफर...
---------------------------------------

मुलांनो, आपल्या महाराष्ट्रात, या मराठी भूमीत अनेक थोर, कर्तबगार माणसं होऊन गेली. तुम्ही ‘बिंगोस्कोप’ हे सिनेमाचं सदर वाचताय ना, तो सिनेमा भारतात सर्वांत आधी कुणी तयार केला माहिती आहे का? ते एक मराठी गृहस्थ होते आणि त्यांचं नाव होतं दादासाहेब धुंडिराज फाळके. सिनेमाला फाळके ‘हलती चित्रे’ असं म्हणत असत. या ‘हलत्या चित्रांच्या दुनियेचा जादूगार’ असलेल्या फाळकेंच्या जीवनावर ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा सुंदर मराठी चित्रपट २०१० मध्ये आला होता. तुम्ही तो अद्याप पाहिला नसेल, तर नक्की पाहा. भारतात पहिला सिनेमा तयार करणाऱ्या या माणसाची कर्तबगारी तुम्हाला त्यातून समजून येईल. 

परेश मोकाशी या रंगभूमी गाजवून आलेल्या रंगकर्मीनं दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट आहे. दादासाहेब फाळके यांनी तयार केलेल्या पहिल्या मूकपटाचं (तेव्हा चित्रपट ‘बोलत’ नसत; केवळ चित्रे दिसत असत. त्यामुळे त्यांना तेव्हा मूकपट म्हणत असत.) नाव ‘राजा हरिश्चंद्र’ असं होतं. त्यावरून मोकाशींनी आपल्या चित्रपटाचं नाव ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ असं का ठेवलं हे आपल्या लक्षात येईल. सिनेमातही स्वत: दादासाहेब आपल्या या उद्योगाला ‘फॅक्टरी’ असंच संबोधत असत. फाळके हे अतिशय हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होतं. ते जादूचे खेळही करायचे. जगात सर्वप्रथम पॅरिस येथे ल्युमिए बंधूंनी मूकपट सादर केला. त्यानंतर तो वर्षभरातच मुंबईतही दाखविला गेला. त्यानंतर मुंबईत पाश्चात्त्यांनी तयार केलेले मूकपट नेहमी दाखविण्यात येऊ लागले. दादासाहेबांनी असाच एक मूकपट पाहिला व ते भारावून गेले. त्यांना जात्याच नवनव्या गोष्टींचं आकर्षण होतं. त्या आपण शिकून घ्याव्यात असं त्यांना वाटे. त्यांनी तो मूकपट वारंवार पाहिला. अगदी त्यांचे डोळे बिघडून दृष्टी जायची वेळ आली. फाळकेंची पत्नी सरस्वती यांनी दादासाहेबांना कायम साथ दिली. आपल्या पतीमध्ये काही तरी असामान्य करण्याची धमक आहे, हे त्यांनी ओळखलं होतं. दादासाहेबांना दोन मुलगे होते. असं हे सुखी कुटुंब, पण दादासाहेबांच्या चित्रपट तयार करण्याच्या वेडापायी त्या कुटुंबाला आपली सर्व संपत्ती गमावायची वेळ आली. मात्र, दादासाहेब डगमगले नाहीत. ते मुंबईतील काही धनाढ्य व्यापाऱ्यांकडून पैसे घेऊन परदेशात चित्रपटाचं तंत्र शिकण्यासाठी गेले. तिथून परत आल्यावर त्यांनी पहिला मूकपट तयार करायला घेतला. त्याचंच नाव - राजा हरिश्चंद्र. हा सिनेमा तयार करताना त्यांना अतोनात अडचणी आल्या. अखेर हा सिनेमा १९१३ मध्ये तयार झाला आणि भारतातील लोकांनी त्याचं प्रचंड स्वागत केलं. भारतातील ‘चित्रपट युगा’ची ती सुरुवात होती.
हा अतिशय रोमहर्षक, अद्भुत प्रवास परेश मोकाशी  यांनी ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटात अतिशय खेळीमेळीनं मांडला आहे. दादासाहेबांची भूमिका नंदू माधव यांनी केली आहे. दादासाहेबांचं सिनेमाचं वेड, त्यांचा विक्षिप्त स्वभाव, जिद्दी वृत्ती हे सगळं नंदू माधव यांनी फार अप्रतिमपणे सादर केलं आहे. त्यांची या भूमिकेतील निवड एवढी चपखल आहे, की त्यांच्या या भूमिकेवरच सिनेमाचं निम्मं यश निश्चित झालं. विभावरी देशपांडे यांनीही सरस्वतीबाईंची भूमिका छान केली आहे. अथर्व कर्वे आणि मोहित गोखले या दोन बालकलाकारांनीही फाळके यांच्या मुलांची कामं मस्त केली आहेत. इतर सर्व सहकलाकारही उत्तम साथ देतात.
मुळात विसाव्या शतकातील तो सुरुवातीचा काळ, भारतातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील व मुंबईतील तत्कालीन समाजजीवन, तत्कालीन रुढी-परंपरा हे सगळं उभं करणं हे दिग्दर्शकासमोर आव्हान होतं. विशिष्ट काळातील गोष्ट सांगणाऱ्या सिनेमांना ‘पीरियड फिल्म’ म्हणतात. ‘हरिश्चंद्रांची फॅक्टरी’ हा तसाच चित्रपट आहे. त्यामुळं या चित्रपटासाठी कलादिग्दर्शन ही महत्त्वाची गोष्ट ठरते. या चित्रपटात वापरलेले नेपथ्य, सेट्स आणि वेशभूषा आवर्जून पाहा. ही सगळी माणसं १९००-१९१३ या काळात साधारणपणे वावरत आहेत हे गृहीत धरून तसे कपडे वापरावे लागतात. तेव्हाची मुंबई कशी दिसत होती, याचा अभ्यास करून तसे सेट्स तयार करावे लागतात. गिरगावात राहणारी मंडळी ‘तिकडे लांब दादरला कुठं जंगलात राहताय,’ असं बोलत असत, असा उल्लेख चित्रपटात आहे. आज हा उल्लेख ऐकताना आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. तेव्हा महिलांनी चित्रपटात काम करणं समाजमान्य नव्हतं. त्यामुळं फाळकेंना तारामतीच्या भूमिकेसाठी काय काय दिव्य करावं लागलं, हे या सिनेमात पाहायला मिळतं. शेवटी एका पुरुषाला या भूमिकेसाठी फाळके तयार करतात. मात्र, त्याचे वडील जिवंत असल्यानं तो मिशी काढायला तयार होत नाही. तेव्हा वडील जिवंत असताना मिशी काढायची नाही, अशी पद्धत होती. अशा अनेक गमती-जमती यात पाहायला मिळतात.
मुळात  ‘पीरियड फिल्म’ बघताना मनोरंजनासोबत आपल्याला त्या त्या काळाची सफर करता येते. त्यामुळे असे चित्रपट आवर्जून बघावेत. या चित्रपटात परेश मोकाशींनी दादासाहेब फाळक्यांचं चित्रपटाचं वेड हर प्रकारे उतरवलं आहे. त्यामुळंच आपल्याला तो चित्रपट पाहताना फाळक्यांविषयीचं कुतूहल आणखी जागृत होतं. त्या व्यक्तीविषयीची उत्सुकता वाढवतं. कुठलीही चांगली कलाकृती हेच काम करत असते. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’सारखा चित्रपट पाहायचा तो यासाठीच. त्यातही एका मराठी माणसाची ही कर्तबगारी बघताना आपणा मराठी लोकांची कॉलर जरा टाइट होणारच ना!

---

हरिश्चंद्राची फॅक्टरी/भारत/२०१०/मराठी/रंगीत/ ९७ मिनिटे

निर्माते : रॉनी स्क्रूवाला, स्मिती कनोदिया, परेश मोकाशी
कथा व दिग्दर्शक : परेश मोकाशी, संगीत : आनंद मोडक
सिनेमॅटोग्राफी : अमलेंदू चौधरी, संकलन : अमित पवार
प्रमुख भूमिका : नंदू माधव, विभावरी देशपांडे, मोहित गोखले, अथर्व कर्वे, संदीप पाठक

---

२०. बॉर्डर
-----------

सीमेच्या रक्षणास तळहातावर शिर
-----------------------------------------

बालमित्रहो, या महिन्यात आपला ७३ वा स्वातंत्र्यदिन येईल. येत्या १५ ऑगस्टला आपण हा स्वातंत्र्यदिन उत्साहानं साजरा करू. त्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असल्याने आपण तो दिवस कसा सेलिब्रेट करायचा, याचं आधीच नियोजन केलं असेल. आपण कुठे तरी सहलीला जाऊ, मित्रांकडे गप्पा मारायला जाऊ, नाही तर मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहायला जाऊ किंवा मॉलमध्ये खरेदीची मजा करायला जाऊ. आपल्याला हे आनंदाचे, स्वातंत्र्याचे दिवस उपभोगायला मिळत आहेत, याचं कारण पूर्वी कुणी तरी आपल्यासाठी जिवाचा त्याग करून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलंय. आपण १५ ऑगस्टच्या दिवशी मजा जरूर करू; पण ती मजा करताना मनात कुठे तरी या अनाम वीरांविषयी आदराची भावनाही जपू.

या दिवशी सिनेमेच पाहायचे तर आपल्या देशाविषयीचा अभिमान आणखी वृद्धिंगत होईल, असे किती तरी सिनेमे पाहता येतील. आज आपण ‘बॉर्डर’ या चित्रपटाविषयी जाणून घेणार आहोत. आपल्या देशाच्या सीमेचे शत्रूपासून रक्षण करण्यासाठी आपले लष्कर, हवाई दल आणि नौदल किती शौर्याने पराक्रम गाजवते, हे आपल्याला हा चित्रपट पाहून कळते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत तीन मोठी युद्धे झाली, तर लहान-मोठे संघर्ष अनेक झाले. यापैकी १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला. याच युद्धानंतर पूर्व पाकिस्तान हा पाकिस्तानचा भाग मूळ पाकिस्तानपासून फुटून स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली. हे युद्ध सुरुवातीपासून पूर्वेला लढले गेले असले, तरी पश्चिम आघाडीवरही पाकिस्तानने भारताच्या कुरापती काढल्याने त्या भागातही (म्हणजे राजस्थान, पंजाब, काश्मीर) दोन्ही देशांदरम्यान युद्ध भडकले. यापैकी ‘लोंगेवालाची लढाई’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या युद्धातील लढाईवर आधारित हा चित्रपट आहे. प्रामुख्याने युद्धविषयक चित्रपटांचीच निर्मिती करणारे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांनी या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केलं आहे. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात, म्हणजे १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्या वर्षी भारतात बॉक्स ऑफिसवरही सर्वाधिक कमाई केली होती. या चित्रपटात सनी देओल, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, सुदेश बेरी, कुलभूषण खरबंदा, पुनीत इस्सार, राखी, पूजा भट यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाला अनू मलिक यांनी संगीत दिले असून, यातले ‘संदेसे आते है’ हे गाणं अतिशय गाजलं.
‘लोंगेवाला’ हे राजस्थानच्या थर वाळवंटात असलेली भारत व पाकिस्तान यांच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरचे एक प्रमुख ठाणे आहे. चार ते सात डिसेंबर १९७१ च्या दरम्यान इथं दोन्ही देशांदरम्यान मोठी चकमक झडली. युद्धच होतं एक प्रकारे ते! यात भारताच्या बाजूने होते केवळ १२० जवान आणि नंतर त्यांच्या मदतीला आलेली चार ‘हंटर’ लढाऊ विमाने; तर पाकिस्तानकडे होते ४० ते ४५ रणगाडे आणि सुमारे दोन ते तीन हजार सैनिक. तरीही या लढाईत अत्यंत शूर अशा भारतीय जवानांनीच बाजी मारली आणि पाकिस्तानी रणगाडे उद्ध्वस्त करून त्यांच्या सैन्याला पार सीमेपार पिटाळून लावले. येथे प्रमुख होते लष्कराच्या २३ व्या बटालियनचे, पंजाब रेजिमेंटच्या कंपनीचे प्रमुख मेजर कुलदीपसिंग चाँदपुरी. मेजर कुलदीपसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून आपले हे ठाणे कसे वाचविले आणि शत्रूचा पराभव केला याची अत्यंत प्रेरणादायी, रोमांचकारक कथा या चित्रपटातून आपल्यासमोर उलगडते. या चित्रपटात मेजर कुलदीपसिंग यांचे काम सनी देओलनं अत्यंत प्रभावीपणे केलं आहे. सेकंड लेफ्टनंट धरमवीर भान या तरुण अधिकाऱ्याचे काम अक्षय खन्नाने केले आहे. विंग कमांडर आनंद बाजवा यांची भूमिका जॅकी श्रॉफने केलीय. नायब सुभेदार मथुरा दासच्या भूमिकेत सुदेश बेरी आहे, तर सीमा सुरक्षा दलाचे सहायक कमांडंट भैरवसिंग यांचं काम सुनील शेट्टीनं केलंय. याव्यतिरिक्त पुनीत इस्सार, कुलभूषण खरबंदा, राखी या ज्येष्ठ कलाकारांसह तबू, पूजा भट या अभिनेत्रींनीही या चित्रपटातील त्यांच्या भूमिका संस्मरणीय केल्या आहेत.
जवळपास तीन तासांच्या या चित्रपटात केवळ युद्धाची थरारक दृश्ये नाहीत, तर युद्धाला तोंड द्यावं लागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मानसिक स्थितीचाही वेध दिग्दर्शकानं यात घेतला आहे. या अधिकाऱ्यांनाही घर असतं, कुटुंब असतं, त्यांच्यासाठी वाट पाहणारे त्यांचे जीवनसाथी असतात. या सगळ्यांचा विचार बाजूला ठेवून त्यांना फक्त समोर ठाकलेल्या शत्रूला नेस्तनाबूत करण्याचं एकमेव लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवायचं असतं. विपरीत परिस्थिती असली, तरी त्यातून मार्ग काढायचा असतो. कुठल्याही क्षणी प्राणाची आहुती पडण्याची शक्यता असते. हे सगळं डोक्यात ठेवूनही शत्रूवर मात करण्याची लढाई लढायची असते. या सगळ्या नातेसंबंधांचा, मानसिक ताणतणावांचा वेध दिग्दर्शकानं या चित्रपटातून घेतला आहे.
पंधरा ऑगस्टच्या दिवशी ‘बॉर्डर’सारखे चित्रपट जरूर पाहा. दोन गोष्टी साध्य होतील. चित्रपट पाहिल्याने एक प्रकारे मनोरंजनही होईल आणि देशासाठी आपले जवान काय करू शकतात, याचे भारावणारे दर्शनही घडेल. आपल्या हातूनही देशासाठी अशी काही तरी सेवा घडावी, ही भावना यातून तुमच्या मनात प्रबळ झाल्यास हा स्वातंत्र्यदिन सार्थकी लागला, असेच म्हणावे लागेल.

---

बॉर्डर/भारत/१९९७/हिंदी-पंजाबी-उर्दू/रंगीत/१७७ मिनिटे

निर्माते : जे. पी. दत्ता, दिग्दर्शक : जे. पी. दत्ता
संगीत : अनू मलिक, पार्श्वसंगीत : आदेश श्रीवास्तव
सिनेमॅटोग्राफी : ईश्वर बिद्री, निर्मल जानी, संकलन : दीपक वीरकूड
प्रमुख भूमिका : सनी देओल, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना, सुनील शेट्टी, सुदेश बेरी, पुनीत इस्सार, कुलभूषण खरबंदा, राखी, तबू, पूजा भट, श्राबनी मुखर्जी

---

२१. ताऱ्यांचे बेट
-------------------

मोरपीस : मोहवणारे अन् शिकवणारेही!
-----------------------------------------------

बालमित्रहो, दिवाळीच्या सुट्टीची तुमची धमाल सुरू झाली असेल ना! दिवाळी म्हणजे मज्जाच! भरपूर शॉपिंग, ट्रिप,सिनेमे आणि मित्र-मंडळींबरोबर हँगआउट... आहे ना मज्जा? आपण अगदी सहज ही मजा करू शकतो, याचे कारण आपल्या आई-वडिलांकडे पुरेसे पैसे आहेत. त्या दृष्टीने आपण अगदी सुदैवी आहोत. पण अनेक मुलांची ही परिस्थिती नसते. आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टींचा हव्यास धरताना आपल्या घरच्यांची, विशेषत: आपल्या बाबांची आपण अडचण तर करीत नाही आहोत ना, याचा विचार मुलांनी करायला हवा. ‘ताऱ्यांचे बेट’ हा किरण यज्ञोपवित दिग्दर्शित चित्रपट आपल्याला नेमकी हीच शिकवण अगदी साध्या-सोप्या प्रसंगांतून करून देतो. तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल, तर या सुट्टीत आवर्जून पाहा. 

कोकणातील एका गावात राहणाऱ्या निम्नमध्यमवर्गीय मुलाला मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये एक दिवस का होईना, पण राहण्याचे पिसे (वेड) लागते. त्याचं हे म्हटलं तर साधंसं; पण त्याच्या पालकांच्या दृष्टीनं विचार केला तर प्रचंड अवघड असं स्वप्न आणि वास्तवाचा पाठशिवणीचा रंगलेला खेळ म्हणजे हा चित्रपट.
श्रीधर सुर्वे (सचिन खेडेकर) हा कोकणामधल्या एका गावात ग्रामपंचायतीत नोकरी करणारा सरळ माणूस. त्याची दोन मुलं ओंकार (ईशान तांबे) व मीरा (अस्मिता जोगळेकर), बायको इंदिरा (अश्विनी गिरी) आणि मुलांची आजी (शुभांगी जोशी) असं हे कुटुंब मजेत जगत असतं. मुलांना सायकलवरून शाळेत सोडवणं, गावातल्या गणपतीशी रोज सुख-दुःखाच्या गप्पा मित्रत्वाच्या नात्यानं बोलणं आणि रात्री भजनात रंगणं असं त्याचं आयुष्य सुरू आहे. मात्र, त्याच्या या आयुष्यात अचानक मुंबई नावाचं ‘ताऱ्यांचं बेट’ येतं. त्याला कामानिमित्त वारंवार मुंबईला जावं लागतं.
एकदा तो बायको आणि मुलांनाही मुंबई दाखवायला घेऊन जातो. मात्र, जवळ फार पैसे नसल्याने मुलांच्या आवडत्या वस्तूही तो खरेदी करू शकत नाही. त्यातच ओंकारला एक पंचतारांकित हॉटेल दिसतं. या हॉटेलात राहण्याचा हट्ट तो करतो. श्रीधर अर्थातच तो पूर्ण करू शकत नाही. मात्र, गावी परत आल्यावर, शाळेत पहिला नंबर काढलास, तर त्या हॉटेलमध्ये राहायला नेईन, अशी पैज तो मुलाबरोबर लावतो. व्रात्य ओंकार पहिला येऊ शकणार नाही आणि त्याचं हे फाइव्ह-स्टार हॉटेलचं वेड कमी होईल, असा त्याचा अंदाज असतो. मात्र, त्या राजमहालासारख्या हॉटेलात राहायला जायचंच, या वेडानं पछाडलेला ओंकार खूप अभ्यास करतो आणि चक्क पहिला नंबर मिळवतो. आता कसोटी श्रीधरची असते. तो मुंबईला जाऊन त्या हॉटेलची चौकशी करून येतो. एका रात्रीसाठी २२ हजार रुपये मोजावे लागणार असतात. श्रीधरची अर्थातच तेवढी ऐपत नसते. त्यामुळं घरासमोरची होडी विकण्याचा निर्णय तो घेतो. तरीही पैसे कमी पडतात. अखेर सच्छिल श्रीधर त्याच्या स्वभावाला न साजेशा गोष्टीही करू लागतो. शेवटी तो आपल्या मुलाचं स्वप्न साकार करण्यात यशस्वी होतो का? स्वप्नांचा हा प्रवास नेमका कसा पूर्ण होतो? या आणि अशा सर्व प्रश्नांची अपेक्षित उत्तरं देत चित्रपट संपतो.
सौरभ भावे यांच्या मूळ कथेवर किरण, सौरभ आणि शैलेश दुपारे यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. या चित्रपटाची सगळी रचना आणि प्रवास बघितला तर ही एक रूपककथा असल्याचं जाणवतं. मूळ लेखक आणि दिग्दर्शक यांना या प्रवासातून काय सुचवायचं आहे, याचा अत्यंत ठळक आणि नेमका संदेश आपल्यापर्यंत पोचतो. या कथेतला ओंकार म्हणजे सध्याच्या जागतिकीकरणानंतरच्या पिढीचं प्रतीक आहे. ही पिढी त्यांच्या आयुष्यातल्या गोलविषयी अत्यंत स्पष्ट आणि नेमकी भूमिका बाळगून आहे.त्यांच्यात कुठलाही गंड नाही, भय नाही. सत्-असत् किंवा भल्या-बुऱ्याच्या त्यांच्या कल्पना वेगळ्या आहेत. आपल्याला काय मिळवायचं आहे, याचं त्यांचं भान नेमकं आहे. मुंबई किंवा पंचतारांकित हॉटेल म्हणजे या पिढीसमोर असलेल्या मटेरियलिस्टिक, ऐहिक गोष्टींचं प्रतीक म्हणायला हरकत नाही. अर्थात या गोष्टी मिळविण्यासाठी प्रचंड कष्ट करायचीही या पिढीची तयारी आहे.
सचिन खेडेकर आणि अश्विनी गिरी यांनी सहज-सोपा अभिनय करून सुर्वे दांपत्य जिवंत केलंय. ईशान तांबे आणि अस्मिता जोगळेकर या बालकलाकारांनीही खूप छान काम केलंय. विशेषतः ईशानचं खास कौतुक करायला हवं. किशोर कदम, विनय आपटे, जयवंत वाडकर छोट्या भूमिकांतही छाप पाडतात. नंदू घाणेकरांचं संगीतही दाद देण्याजोगं. विशेषतः मुग्धा वैशंपायन हिच्या आवाजातलं ‘पिसे लागले मोरपिसांचे...’ हे रत्नाकर मतकरींचं गीत खासच‌! सुरेश वाडकरांच्या आवाजातला अभंगही जमून आलेला.
थोडक्यात, आपल्या जगण्याचं हे रूपकात्मक प्रतिबिंब जरूर पाहा.  

---

ताऱ्यांचे बेट/भारत/२०११/मराठी/रंगीत/१२१ मिनिटे

निर्माते : शोभा कपूर,एकता कपूर, शीतल भाटिया
दिग्दर्शक : किरण यज्ञोपवित, पटकथा-संवाद : किरणयज्ञोपवित, सौरभ भावे, शैलेश दुपारे
संगीत : नंदू घाणेकर, सिनेमॅटोग्राफी : सुधीर पलसाने
भूमिका : सचिन खेडेकर,अश्विनी गिरी, ईशान तांबे, अस्मिता जोगळेकर, किशोर कदम, विनय आपटे, जयवंत वाडकर

---

(समाप्त)

---

2 comments: