28 Sept 2019

रिव्ह्यू - छिछोरे

थ्री चीअर्स फॉर ‘लूजर्स’
---------------------------



यश म्हणजे नक्की काय? एखाद्या प्रवेश परीक्षेत नंबर लागणे? दहा लाख मुलांमध्ये पहिला नंबर मिळविणे? जन्मल्यापासून शक्य त्या सर्व स्पर्धांमध्ये धावून दर वेळी पहिला क्रमांक मिळविण्याचे अशक्यप्राय काम करीत राहणे? यशस्वी होणं कशाला म्हणायचं? आणि मुळात हे यश मिळवायचं ते कशाची किंमत मोजून? आयुष्य महत्त्वाचं की आयुष्यातलं कथित ध्येय? आयुष्यच नसेल तर या सगळ्याला काय अर्थ?
अशा काही मूलभूत प्रश्नांना हात घालणारा, आजच्या पिढीसोबत पालक पिढीच्याही संघर्षाचं दर्शन घडविणारा ‘छिछोरे’ (शब्दश: अर्थ पोकळ, अर्थहीन) हा नवा हिंदी चित्रपट म्हणजे आजच्या स्पर्धेच्या युगात धाव धाव धावणाऱ्या सगळ्या पालकांच्या डोळ्यांत घातलेलं झणझणीत अंजनच म्हणावं लागेल. नीतेश तिवारी दिग्दर्शित हा चित्रपट आपल्याला आवडतो, याचं कारण आज चाळिशीत असलेल्या पिढीच्या तारुण्याचंही तो दर्शन घडवतो आणि आज या पिढीला त्यांच्या मुलांच्या पिढीबाबत पडत असलेल्या प्रश्नांनाही तो हात घालतो.

SPOILER ALERT

या चित्रपटाचे सरळ दोन भाग आहेत. एक आहे तो आजच्या काळातला आणि दुसरा आहे तो फ्लॅशबॅकमधला. आपला नायक अनिरुद्ध पाठक (सुशांतसिंह राजपूत) आणि माया (श्रद्धा कपूर) या जोडप्याचा मुलगा राघव जेईईमध्ये नंबर येईल की नाही, या चिंतेत आहे. त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आहे आणि राघव वडिलांकडे राहतो आहे. प्रचंड ताणात असलेल्या राघवची मन:स्थिती वडिलांच्या लक्षात येत नाही. जीईईत नंबर न आल्यानं अत्यंत घाबरलेला राघव आत्महत्येचा प्रयत्न करतो आणि त्याच्या आई-वडिलांचे डोळे खाडकन उघडतात. आपल्या मुलाला आपण सदैव ‘लूजर’ होण्याचा ताण देत होतो, हे त्यांच्या लक्षात येतं. राघव रुग्णालयात मृत्युशय्येवर पडलेला असतो आणि त्याच्या वडिलांना त्यांचं तरुणपण आठवतं. त्या कॉलेजमधले एकेक अवली मित्र आठवतात आणि ही सगळी गोष्ट मुलाला सांगण्याचं ते ठरवतात. तिथून फ्लॅशबॅक सुरू होतो. अनिरुद्ध ऊर्फ अनीच्या कॉलेजच्या दिवसांची धमाल गोष्ट सुरू होते. इथले त्याचे ‘सेक्सा’, ‘अॅसिड’, ‘मम्मी’, ‘बेवडा’ अशा अत्रंगी नावाचे मित्र आणि डेरेक हा आणखी एक मित्र त्याला आठवतात. त्याच्या सांगण्यावरून ते थेट हॉस्पिटलमध्येच येतात आणि मित्राच्या अल्बमच्या माध्यमातून त्यांच्या कॉलेज दिवसांच्या धमाल आठवणींत रमतात. या आठवणी सांगण्याचा मुख्य उद्देश काय असतो, हे आपल्या लक्षात येतंच.
अनी आणि त्याचे हे मित्र कॉलेजमध्ये ‘लूजर्स’ म्हणून प्रसिद्ध असतात. त्यांच्या ‘एच - ४’ या बदनाम होस्टेलची आणि तिथल्या एक से एक मित्रांची ओळख आपल्याला व्हायला लागते. दिग्दर्शकानं या फ्लॅशबॅकमध्ये टिपलेलं ‘नाइन्टीज’चं वातावरण आज चाळिशीत असलेल्या माझ्यासारख्या अनेकांना नॉस्टॅल्जिक करणारं आहे. हाच सिनेमातला सगळ्यांत धमाल आणि हास्यस्फोटक भाग आहे. होस्टेलवरचं रॅगिंग, एकेका मित्राची होत जाणारी ‘ओळख’, इतर होस्टेलबरोबर असलेली दुश्मनी आणि सगळ्यांत शेवटी स्पोर्ट चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी केलेली प्रचंड धडपड... हा सगळाच भाग जमून आला आहे. या सर्व ‘लूजर्स’ची होणारी मैत्री आणि त्यातून त्यांनी स्पर्धा जिंकण्यासाठी प्राणपणाने केलेली मेहनत, त्यांच्या आवडत्या गोष्टींचा त्याग या सगळ्या गोष्टी पाहायला मजा येते. हा भाग पाहताना अनेकांना आपल्या कॉलेजच्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कॉलेजमध्ये, मित्रांमध्ये बोलली जाणारी टपोरी भाषा यात ऐकायला मिळतेच; पण सेन्सॉरमुळे आता काही ठिकाणी, काही शिव्यांचा ‘बीप’चं जे बूच बसलंय ते आता हास्यास्पद वाटतं. वेबसीरीज पाहायला चटावलेल्या माझ्यासारख्या प्रेक्षकाला त्या शिव्या सहजी ओळखी येतातच. पण इथं त्यांचं ‘म्यूट’ होणं रसभंग करणारं वाटतं. अर्थात चित्रपटाचं हे एवढंच आकर्षण नाहीय.
चिल्लर पार्टी, भूतनाथ रिटर्न्स, दंगल यासारखे यशस्वी चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक नीतेश तिवारीला, आपल्याला या सिनेमातून काय सांगायचंय हे नेमकं ठाऊक आहे. आजच्या पिढीवरचे ताण आणि त्यातून येणारी एकारलेली मानसिकता या सगळ्यांवर दिग्दर्शक भाष्य करू इच्छितो. आता कॉलेजवयीन मुलाचा पालक झालेला अनिरुद्ध एकदा म्हणतो, ‘जीईईला दहा लाख मुलं बसतात. त्यातले दहा हजार यशस्वी होतात. उरलेल्या नऊ लाख नव्वद हजार मुलांचं काय? आपण त्यांना तुम्ही परीक्षेत अयशस्वी झाल्यानंतर काय करायचं असतं, हे कधी सांगतच नाही. त्यामुळं त्या मुलांना वाटू लागतं, की आपण या परीक्षेत अयशस्वी झालो, म्हणजे आयुष्यातच अयशस्वी झालो. तसं नसतं हे त्यांना कोण सांगणार?’ अनिरुद्धच्या या सवालावर या चित्रपटाचा सग‌ळा फोकस आहे. खुद्द अनिरुद्धनं त्याच्या कॉलेजमधल्या दिवसांत त्यांनी नक्की काय केलं होतं, हे मुलाला आधी कधी सांगितलेलं नसतं. मुलगा जेव्हा रुग्णालयात मृत्युशय्येवर पडतो तेव्हाच त्याला मुलाला हे सांगावंसं वाटतं. त्याचं आणि मायाचं नातं का तुटलं, हे चित्रपटात नीटसं समजत नाही. मात्र, त्याचं सतत कामात असणं दिग्दर्शकानं सूचित केलंंय.
आपण आयुष्यात नक्की काय करायचंय, आपले प्राधान्यक्रम कोणते, पैसा किती आणि कसा मिळवायचा, कुटुंबाचं स्थान/महत्त्व किती या सगळ्यांचाच पुन्हा विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे.
या चित्रपटात सुशांतसिंह राजपूतनं अनिरुद्धची मुख्य भूमिका केली आहे. प्रौढ पालक झालेला अनिरुद्ध आणि कॉलेजमधला टपोरी अनी ही दोन्ही रूपं त्यानं चांगली दाखविली. श्रद्धा कपूर ही एकमेव अभिनेत्री या चित्रपटात आहे. (अगदी कॉलेजमध्येही तिला एकही मैत्रीण वगैरे दाखववलेली नाही. इंजिनीअरिंग कॉलेजमधला मुलींचा तुटवडा हा संदर्भ एकदा येतो.) तिनंही मायाचं काम व्यवस्थित केलंय. मात्र, ती कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलाची आई वाटत नाही, हेही खरं. सगळ्यांत धमाल आणली आहे, ती अनीच्या अवली मित्रांची कामं करणाऱ्या कलाकारांनी. वरुण शर्मा (सेक्सा), तुषार पांडे (मम्मी), नवीन पोलिशेट्टी (अॅसिड), सहर्षकुमार शुक्ला (बेवडा), ताहीर राज भसीन (डेरेक) हे सगळे कलाकार धमाल काम करतात. व्हिलन रॅगीचं काम प्रतीक बब्बरनं केलंय.
इतर छोट्या-मोठ्या भूमिकांतले कलाकारही लक्षात राहतात. उदा. होस्टेलच्या क्लार्कची भूमिका करणारा सानंद वर्मा.
उत्तरार्धात चित्रपट ठरावीक वळणं घेत अपेक्षित शेवट गाठतो. शिवाय लांबी थोडी कमी असती, तरी चाललं असतं, असं वाटतं. नव्वदच्या दशकातले इतर काही रेफरन्स (उदा. क्रिकेट, गाणी, सिनेमे) पटकथेत आली असती तरी अजून मजा आली असती, असंही वाटून गेलं. पण तरीही हा सिनेमा मनोरंजनाची एक विशिष्ट पातळी कायम राखतो. कंटाळा येत नाही, हे महत्त्वाचं. चित्रपटाला संगीत प्रीतमचं आहे. गाणी सिनेमात ऐकायला बरी वाटली, पण नंतर लक्षात राहिली नाहीत. एंड स्क्रोलला येणारं गाणं व त्यात दोन्ही पिढ्यांतली पात्रं एकत्र नाचतात, ही कल्पना छान होती.
तेव्हा आजच्या वेगवान स्पर्धेच्या काळात आपल्या मुलांबाबत नक्की कोणते निर्णय घ्यायचे, लादायचे हे ठरविण्यापूर्वी मुलांसह एकदा हा चित्रपट जरूर पाहा. कदाचित आपल्यात बदल झालेला असेल.

---

दर्जा - साडेतीन स्टार
---






2 Sept 2019

अनिल अवचट पंचाहत्तरी - मटा लेख

मस्त कलंदर
-----------


अनिल अवचट ऊर्फ बाबा या माणसाचं वर्णन करण्यासाठी कलंदर किंवा अवलिया हेच शब्द वापरावे लागतात. लेखक, पत्रकार, संपादक, (प्रॅक्टिस न करणारा) डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ता, अभ्यासक, चित्रकार, शिल्पकार, गायक, ओरिगामी तज्ज्ञ, बासरीवादक, नवनव्या गोष्टी शिकण्याची मनस्वी आवड असणारा विद्यार्थी, दोन मुलींचा उत्तम पालक... एका माणसात किती गोष्टी असाव्यात! अवचटांचं आयुष्य अशा विविधरंगी गोष्टींनी फुललेलं आहे. सर्व ऋतूंत बहरणारं हे वेगळंच ‘झाड’ आहे. विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या जडणघडणीचे ते डोळस साक्षीदार आहेत. त्यांनी आयुष्यात जे जे पाहिलं, अनुभवलं, ते ते लहान मुलाच्या कुतूहलानं पाहिलं व अनुभवलं. लोकांना सांगताना मात्र एखाद्या जाणत्या माणसानं लहान मुलांना सांगावं, तशा समजुतीनं, नीट सांगितलं. जगण्याचे विविध अनुभव घेतले; अगदी मनस्वीपणे घेतले. स्वत:चं मध्यमवर्गीय विश्व कधी लपवलं नाही, पण त्याचा अनाठायी बडेजावही केला नाही. उलट शक्य होईल तेव्हा मध्यमवर्गीय असण्याची बंधनं तोडण्याचाच प्रयत्न केला. कधी जमला, कधी नाही जमला! मात्र, अवचट कशात अडकून पडले नाहीत. पुढं चालत राहिले. एका वयात सामाजिक क्रांती करण्याचं वेड त्यांच्या अंगात होतं. मात्र, ते प्रकृतीला झेपत नाही असं लक्षात आल्यावर शांतपणे बाजूला झाले. हा काही तरी आयुष्यात मोठा पराभव झाला आहे, असा भाव कधी ठेवला नाही. नंतर बराच काळ शोधपत्रकारितेत रमले. जे काम करायचं, ते व्यवस्थितच अशी वृत्ती असल्यानं आणि मूळ स्वभाव सर्व गोष्टींविषयी जात्याच कुतूहल बाळगणारा असल्यानं ही शोधपत्रकारिताही त्यांनी गाजविली. महाराष्ट्राला तोवर फारसा माहिती नसलेला ‘रिपोर्ताज’ प्रकार त्यांनी हाताळला. नंतर लोक त्यालाच ‘अवचट शैली’ म्हणू लागले. ‘मी मुद्दाम असं काही लिहिलं नाही, जे भिडलं, आतून लिहावंसं वाटलं ते लिहीत गेलो,’ असं त्यांनी नंतर अनेक मुलाखतींतून सांगितलं. मात्र, काही विशिष्ट गुण किंवा प्रतिभा असल्याशिवाय कुणालाही असं लिखाण करता येत नाही. अवचटांच्या ‘मनोहर’ किंवा ‘साधने’तल्या पत्रकारितेचं वैशिष्ट्य असं, की त्यांनी मुंबई किंवा पुण्याच्या बाहेर पसरलेला विस्तृत, पण बेदखल असा महाराष्ट्र आपल्या लेखणीतून सगळ्या समाजासमोर आणला. ‘संभ्रम’ किंवा ‘कोंडमारा’मधले त्यांचे लेख वाचले, की याची प्रचिती येते. अवचटांना समाजातल्या शेवटच्या घटकाविषयी ममत्व आहे. कथित कनिष्ठ जातींतले, कथित अस्पृश्य आणि नाडलेले, गांजलेले असे अनेक व्यक्तिसमूह त्यांच्या लेखनाचा विषय झाले. ‘माणसं’ हे त्यांचं पुस्तक आलं, तेव्हा ते वाचून महाराष्ट्र हादरून गेला. आपल्याभोवती छोट्याशा सुखाचा कोष विणून आत्मरत असलेल्या मध्यमवर्गाला त्यांनी आपल्या लेखणीतून दाहक सामाजिक वास्तवाचे चटके दिले. तत्कालीन मध्यमवर्गीयांत संस्कारांमधली संवेदनशीलता टिकून असल्यानं त्यांनीही हे लिखाण वाचलं आणि स्वीकारलं. महाराष्ट्रात गेली शंभर-दीडशे वर्षं कथित पुरोगामी आणि कथित सनातनी असे दोन वर्ग कायमचे पडलेले आहेत. कुणी कुठल्या वर्गात असायचं, याचे संकेतही ठरलेले आहेत. अवचट यांच्या लेखणीची जादू अशी, की तिने हे संकेत मोडून काढले. अवचट दोन्ही वर्गांना आपलेसे वाटले. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लेखक म्हणून असलेला त्यांचा प्रामाणिकपणा आणि साधेपणा! 
आपल्याकडं अनेकदा प्रामाणिकपणा हा जणू कमावलेला गुण असल्यासारखा मिरवला जातो. काहींचा साधेपणा हा भाबडेपणाकडं, तर क्वचित बावळटपणाकडं झुकतो. याचं कारण आपल्या समाजाची पूर्वापार चालत आलेली दांभिक वृत्ती. अवचट मात्र याला अपवाद ठरले. याचं कारण त्यांच्यातला लेखक आणि त्यांच्यातला माणूस हे वेगळे कधीच नव्हते. ते जसं जगले, तसं लिहीत गेले. त्यांच्या अनेक लेखांची नावे ‘घडले तसे’, ‘दिसले तसे’ अशी आहेत. त्यामुळं अवचटांमधला प्रामाणिकपणा वाचकांना पटला, भावला. त्यांच्यातला साधेपणा अनेकांनी प्रत्यक्ष अनुभवला आणि सगळ्यांना सांगितला. त्यामुळंच कथा-कादंबरी, कविता किंवा विनोदी साहित्य अशा कुठल्याही पठडीत त्यांचं साहित्य रूढार्थानं बसत नसतानाही ते लेखक म्हणून अमाप लोकप्रिय झाले. त्यांची सुरुवातीच्या काळातली सगळीच पुस्तकं ‘नॉन-फिक्शन’ प्रकारातली होती आणि तत्कालीन इतर लेखकांच्या मानानं निराळी होती. तरीही तेव्हाच्या वाचकांनी ती उचलून धरली. अवचटांच्या व्यक्तिमत्त्वातल्या पारदर्शकतेचाचा हा परिणाम होता. त्यांनी घेतलेले काही अनुभव केवळ सर्वसाधारण वाचकांच्याच नव्हे, तर सर्वसाधारण लेखकांच्याही परिघाच्या बाहेरचे होते. अवचट ओतूरसारख्या छोट्या गावातून आले. त्यांचा जन्म १९४४ चा. स्वातंत्र्यानंतरचा बदलता देश आणि बदलता महाराष्ट्र बघत त्यांची पिढी मोठी झाली. सत्तरच्या दशकातला स्वप्नाळूपणा आणि बंडखोरी अशा दोन्ही गोष्टी या पिढीनं अनुभवल्या. अवचट यांचे वडील डॉक्टर व घराणं गावातलं प्रतिष्ठित. त्यामुळं तत्कालीन परंपरेप्रमाणं त्यांनाही डॉक्टर होणं भागच होतं. त्याप्रमाणे ते बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये गेलेही. मात्र, त्यांचा कल पहिल्यापासूनच डॉक्टरकी न करण्याकडंच राहिला. एकच एक गोष्ट आयुष्यभर करत बसणं त्यांच्यातल्या कलंदर माणसाला आवडणं शक्यच नव्हतं. मात्र, या कॉलेजात अवचटांना ‘सुनंदा’ भेटली. सुनंदा ऊर्फ अनिता अवचट यांच्या आयुष्यात येण्यानं अवचटांचं आयुष्यच बदलून गेलं. त्यांच्या आयुष्याला एक दिशा मिळाली. ‘तुला हवं ते कर, मी घर सांभाळते’ असं बिनधास्त सांगणारी जीवनसाथी मिळणं हे अवचटांचं भाग्य होतं. सुनंदाताईंच्या पाठबळावर अवचटांनी पुढं आयुष्यात पुष्कळ ‘उद्योग’ केले. बहुसंख्य मराठी माणसासाठी चौकटीतलं जगणं हेच प्राक्तन असताना अवचटांना निराळं आयुष्य जगायची संधी मिळाली. त्यांच्या अंगातल्या कलंदरपणामुळं त्यांनी ती पुरेपूर उपभोगली. त्यांचे अनुभव ऐकून, वाचून चौकटबद्ध मराठी वाचकांना एका वेगळ्याच ‘फँटसी’ची अनुभूती मिळाली. आपण सहसा करू शकत नाही त्या गोष्टी सहजी करणाऱ्या लेखकांचं, व्यक्तिश्रेष्ठांचं वाचकांना आकर्षण असतंच. गौरी देशपांडेंचं लेखन वाचताना त्या आकर्षणाची प्रचिती येते. अवचटांच्या लेखनातूनही वेगळ्या पद्धतीची ‘फँटसी’ मराठी वाचकांचं समाधान करून गेली. अवचट लेखक म्हणून लोकप्रिय होण्यात या घटकाचा वाटा दुर्लक्षिता येण्यासारखा नाही. 
काळ बदलला तसे अवचटही बदलत गेले. त्यांनी कधी स्वत:ला ‘स्टीरिओटाइप’ केलं नाही. ‘गर्द’च्या व्यसनाचा अभ्यास करताना त्यांना या महाभयंकर समस्येचं अक्राळविक्राळ स्वरूप समजलं. या व्यसनाधीन लोकांसाठी काही तरी केलं पाहिजे, असं त्यांनी व अनिता अवचट यांनी ठरवलं. त्यातून पु. ल. देशपांडे दाम्पत्याच्या मदतीतून ‘मुक्तांगण’ची सुरुवात झाली. काळाच्या पुढचा विचार त्यामागं होता. आज मोबाइलपासून सुटका होण्यासाठी या केंद्रात उपचारांची सोय झाली आहे, याला द्रष्टेपणच म्हणायचं नाही तर काय! नव्वदमध्ये अवचटांनी लिहिलेलं ‘स्वत:विषयी’ हे एक आगळं-वेगळं पुस्तक आलं आणि अवचटांच्या चाहत्यांत मोठी भर पडली. हा अवलिया बाबा एक मुलगा म्हणून, विद्यार्थी म्हणून, मित्र म्हणून, प्रियकर म्हणून, नवरा म्हणून, पालक म्हणून कसा होता; त्याची जडणघडण कशी झाली हे मराठी वाचकांना या पुस्तकातून कळलं. पु. ल. आणि सुनीताबाईंना ‘महाराष्ट्राचं फर्स्ट कपल’ म्हटलं जातं. त्यांचा तो मान अबाधित ठेवून अनिल व सुनंदा या दाम्पत्याला ‘महाराष्ट्राचं दुसरं लाडकं दाम्पत्य’ म्हणता येईल, एवढी लोकप्रियता या पुस्तकाला आणि पर्यायानं अवचट दाम्पत्याला लाभली. मात्र, पुढच्या काही वर्षांतच, १९९७ मध्ये सुनंदा यांचं कर्करोगानं आकस्मिक निधन झालं. हा धक्का मोठा होता. अवचट पूर्वीचे राहिले नाहीत. मात्र, मुक्ता व यशोदा या अवचटांच्या दोन गुणी मुलींनी ‘बाबा’ला हळुहळू पुन्हा पूर्वपदावर आणलं. यानंतरच्या काळातले लेखक अवचट वेगळे होते. त्यांना आता ‘मस्त मस्त उतार’ सापडला होता. आता हा बाबा मुलाबाळांत अधिक रमू लागला. ओरिगामी, बासरी, काष्ठशिल्पं यात जीव रमवू लागला. लेखांचेही विषय बदलले. लेखनातला आक्रमकपणा लुप्त झाला. माया, जिव्हाळा, वात्सल्य या भावना वरचढ झाल्या. लहान मुलासारखी निरागसता आणि कुतूहल हे मात्र सदैव कायम राहिलं. 
सध्या बुवाबाजीचं थोतांड पुन्हा वाढलंय. अवचटांनी आयुष्यभर त्याचा विरोध केला. मात्र, ज्याच्या लेखनाबाबत ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ म्हणावं, असा हा आवडता लेखक आहे.  
लौकिकार्थानं बाबाला अनेक पुरस्कार मिळाले. मान-सन्मान मिळाले. मात्र, त्यानं पुस्तकातून जोडलेले वाचक आणि प्रत्यक्ष जीवनात जोडलेली अक्षरश: शेकडो लहान-थोर माणसं हाच त्याचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे. बाबानं मागच्या सोमवारी (२६ ऑगस्ट) वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. मात्र, त्याच्या नजरेतलं मूलपण आजही कायम आहे आणि हे निरागस मूलपण हाच आजच्या ‘बाबा’चा सर्वांत सुंदर दागिना आहे!

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, संवाद पुरवणी, १ सप्टेंबर २०१९)

---