31 May 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - सिटीलाइट्स

‘शहर’ नावाचा चक्रव्यूह
-----------------------------

 
दूर राजस्थानातून मुंबईसारख्या महानगराच्या चक्रव्यूहात शिरणाऱ्या एका ‘अभिमन्यू’ची एक अत्यंत संवेदनशील, तरीही रंजक कथा दिग्दर्शक हंसल मेहतानं ‘सिटीलाइट्स’च्या रूपानं सादर केली आहे. शॉन एलिसच्या ‘मेट्रो मनिला’ या सिनेमावर ‘सिटीलाइट्स’ आधारित आहे. (म्हणजे रीतसर फ्रेम टु फ्रेम रिमेक आहे.) गोष्टीचं रंजनमूल्य कायम ठेवून, पात्रांच्या अंतःकरणातले सर्व पापुद्रे सोलवटून दाखवण्याची किमया दिग्दर्शकानं यात साधली आहे. गोष्टीतलं मध्यवर्ती सूत्र व्यक्तिकेंद्री ठेवूनही तिला प्रतीकात्मक, व्यापक आशय देण्यात मेहता यशस्वी झाले आहेत. त्यामुळंच काही त्रुटी असल्या, तरी ‘सिटीलाइ्टस’ हा मेंदूला खाद्य देणारा एक सुखद अनुभव ठरतो.
जगात सर्वच ग्रामीण भागातून शहरांकडे, कमी विकसित भागाकडून विकसित महानगरांकडे नागरिकांचा लोंढा वाहत असतो. हे स्थलांतर सोपं नसतं. एक आख्खी पिढी, एक संस्कृती यात खर्ची पडत असते. त्या स्थलांतराची वेळ आलेल्या व्यक्तिविशेषांवर तर फारच बिकट प्रसंग आलेला असतो. एखादं जुनं झाड मुळासकट उपटून दुसरीकडं रुजवण्याचा प्रयत्न करण्याएवढंच हे अवघड असतं. हा संघर्ष अस्सल असतो; त्या त्या पिढीच्या मूल्यांची, नीतिमत्तेची, तत्त्वनिष्ठेची परीक्षा पाहणारा असतो. पोटात आग पडलेली असताना, डोक्यावर छत नसताना, कुठलाच आसरा नसताना जगणं टिकवायचं असतं. त्यासोबत जन्मापासून आलेल्या सर्व रुढी-परंपरांची, तथाकथित प्रतिष्ठेची बूजही राखायची असते. हा सनातन झगडा ज्यांच्या वाट्याला येतो, त्यांची त्यात पार होरपळ होते. शहर नावाच्या चक्रव्यूहात अनेक जण शिरतात. पण त्यातून बाहेर पडणं त्यांना कधीच जमत नाही. अशी हजारो, लाखो माणसं गिळून, त्यांचं ‘शहरवासीय’ नावाच्या एका बिनचेहऱ्याच्या महान गर्दीत रूपांतर करण्याचं काम ‘महानगर’ नावाची चेटकीण वर्षानुवर्षं करीत आली आहे. तिचा हा भेसूर चेहरा सर्वांनाच दिसतो; पण आपला चेहरा नाहीसा झाल्यानं तो दिसूनही काहीच करता येत नाही. तिला शरण जाऊन, पोटासाठी तिच्याच पोटात आश्रय घेऊन, जगणं धुंडाळायची पाळी सर्वांवर येते.
हा संघर्ष अनेक प्रतिभावंतांना प्रेरणा देत आला आहे. २०१३ मध्ये आलेल्या शॉन एलिसच्या ‘मेट्रो मनिला’त (फिलिपिन्सच्या राजधानीसाठी रूढ असलेला शब्द म्हणजे ‘मेट्रो मनिला’) हा संघर्ष दिसतो. हंसल मेहतानं त्याला भारतीय रूपडं देऊन ‘सिटीलाइट्स’ सादर केला आहे. तिथला ऑस्कर रामीरेझ इथं राजस्थानातला दीपकसिंह (राजकुमार राव) झाला आहे. माई रामीरेझ इथं राखी (पत्रलेखा) झाली आहे. तिथला आँग इथं विष्णू (मानव कौल) झाला आहे. कर्जाच्या विळख्यात बुडालेल्या दीपकचं दुकान जप्त होतं. त्यामुळं पोटापाण्यासाठी महानगरी मुंबईचा रस्ता धरण्याचा निर्णय तो घेतो आणि बायको व मुलीसह मुंबईत येतो. दाखल झालेल्या दीपकला शहरातील फसवणुकीचा फटका प्रारंभीच बसतो. अखेर त्याला एका खासगी सिक्युरिटी कंपनीत विष्णूच्या मदतीनं नोकरी लागते. या विष्णूला एका कामासाठी हवा असाच माणूस दीपकच्या रूपानं मिळतो. काय असतं त्याचं काम? राखी काय करते? या कुटुंबाचं पुढं काय होतं, हे प्रत्यक्षच पाहायला हवं.
हंसल मेहतांनी हा संघर्ष चांगला रंगवला असला, तरी दोन तासांच्या या सिनेमात काही क्षण कंटाळवाणे येतात. विशेषत: पूर्वार्धात. मुंबईत आल्यानंतर ज्या पद्धतीनं हे कुटुंब फसतं आणि स्वतःचे सर्व पैसे घालवून बसतं, ते पटत नाही. उलट शहरी माणसांपेक्षा ग्रामीण भागातील माणसं अधिक चतुर असतात. त्यांच्याकडं व्यावहारिक शहाणपण अधिक असतं. पण एखाद्या परदेशी सिनेमाची कथा ‘जशीच्या तशी’ सादर करताना हे दुवे दिग्दर्शकाकडून निसटले असावेत. शिवाय दीपकला आपली पत्नी डान्सबारमध्ये कामाला जाते, हे आधी कसं कळत नाही? तो स्वतः विष्णूबरोबर जेव्हा तिथं जातो तेव्हाच त्याला हे कळतं. हेही पटत नाही. कारण त्याआधी एकदा त्यानं पत्नीला ‘पैसे कुठून आणलेस,’ असं विचारलेलं असतं. त्यावर ती रडते आणि तो प्रसंग तिथंच संपतो. शिवाय क्लायमॅक्स अगदीच अतर्क्य नसला, तरी ‘फिल्मी’ आहे. तोपर्यंत कथेनं राखलेलं एक जिवंतपण, सच्चेपण या शेवटामुळं मार खातं, असं वाटून जातं. शिवाय या सिनेमाच्या ‘लूक’मध्येही प्रॉब्लेम आहे. अनेक फ्रेममधील लाइट आणि एकूणच त्या फ्रेमची रचना मार खाणारी झाली आहे.

या त्रुटी असल्या, तरी राजकुमार राव या अभिनेत्यासाठी हा सिनेमा पाहावा. यापूर्वी राव-मेहता जोडीनं ‘शाहिद’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेला आहेच. या सिनेमातही राजकुमार रावनं कमाल केली आहे. दीपकसिंहची भूमिका त्यानं खूपच तन्मयतेनं साकारली आहे. कर्जात बुडालेला, कुटुंबाची काळजी असलेला, सुरुवातीला सदैव खांदे पाडून चालणारा, नंतर सूडाच्या भावनेनं पेटून उठलेला असा दीपक रावनं जबरदस्त उभा केला आहे. पत्रलेखा या नवोदित अभिनेत्रीचं कामही उल्लेखनीय. विशेषतः डान्सबारमध्ये नोकरी मागायला जाण्याचा प्रसंग आणि मोबाइलवरील गाण्यावर नृत्य करायला लागण्याचा करुण प्रसंग तिनं फारच प्रभावीपणे साकारला आहे. हल्ली हिंदी सिनेमांत नायक-नायिकांची शारीर जवळीक अफाट असते आणि याही सिनेमात सुरुवातीलाच तो प्रसंग दाखवून दिग्दर्शकानं आपला एक ‘केआरए’ पूर्ण केला आहे. पत्रलेखाही या रोमँटिक चुंबनदृश्यात अत्यंत सहजरीत्या वावरली आहे. असो. या सिनेमातलं खरं सरप्राइज पॅकेज ठरला आहे तो मानव कौल. दीपकला नोकरी देणाऱ्या विष्णू या सुपरवायझर सिक्युरिटी ऑफिसरच्या भूमिकेत मानवला खूपच फुटेज मिळालं आहे आणि त्यानंही हा रोल चांगला साकारला आहे. नायकाचा मित्र ते (जवळपास) खलनायक अशी चांगली रेंज त्याला मिळाली आहे.
सिनेमाला संगीत जित गांगुली यांचं संगीत आहे. ‘सोने दो’ हे गाणं लक्षात राहतं. बाकीचीही गाणी चांगली असली, तरी ती अनेकदा मध्येच येऊन रसभंग करतात. त्यांचं प्रमाण कमी ठेवायला हवं होतं.
एक चांगली गोष्ट म्हणजे, परकीय सिनेमावरून थेट ढापण्यापेक्षा भट्ट मंडळींनी ‘मेट्रो मनिला’चे रीतसर हक्क घेऊन आणि सिनेमाच्या नामावलीत मूळ सिनेमाचं श्रेय देऊन प्रेक्षकांप्रती पुरेशी पारदर्शकता राखली आहे.
थोडक्यात, एक वेगळा, डोक्याला झिणझिण्या आणणारा अनुभव घ्यायचा असल्यास या सिनेमाच्या वाट्याला जावं. ज्यांनी ‘मेट्रो मनिला’ पूर्वीच पाहिला आहे, त्यांनीही किमान राजकुमारसाठी एकदा हा सिनेमा पाहायला हरकत नाही.
---
निर्माता : मुकेश भट्ट
दिग्दर्शक : हंसल मेहता
पटकथा : रितेश शाह
संगीत : जित गांगुली
प्रमुख कलाकार : राजकुमार राव, पत्रलेखा, मानव कौल
कालावधी : दोन तास सहा मिनिटे
दर्जा : *** १/२
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, ३१ मे २०१४)
---

3 May 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - सलाम

साध्या-सच्च्या जगण्याचा कानमंत्र
 ---------------------------------------------------------------------
 किरण यज्ञोपवीतच्या कलाकृती दर वेळी आपल्याला जगण्याविषयीचं एक नवं भान देऊन जातात. म्हणजे त्या खूप काही वेगळं, या जगाबाहेरचं, अतर्क्य सांगतात असं नाही. उलट आपल्याच मातीतून रुजलेल्या, ज्यावर आपला पिंड घडला आहे, पोसला आहे अशा साध्या-सोप्या मूल्यांची आठवण करून देतात. ही मूल्यं आपण सध्या वेगानं विसरत चाललो आहोत, म्हणूनच त्यांची आठवण मनात पुन्हा जागवणाऱ्या या कलाकृतींचं मोल अधिक! या दिग्दर्शकाच्या ‘ताऱ्यांचं बेट’ किंवा ‘सुखान्त’ यासारख्या कलाकृती पाहिल्या म्हणजे याची कल्पना येते. आता किरणनं ‘सलाम’ या आपल्या नव्या सिनेमाद्वारे मैत्रीसारख्या चिरंतन नात्याचा नवा अर्थ उलगडून सांगितला आहे. पोलिस आणि लष्करात काम करणाऱ्या दोन तरुणांची दोन मुलं सिनेमाचे नायक असल्यानं त्यांच्या गोष्टीला या दोन मिती आपसूकच लाभल्या आहेत. या अनोख्या नात्यांच्या गोष्टीला गावाचं, शेताचं, नदीचं आणि हिरव्यागार निसर्गाचं डौलदार नेपथ्य असल्यानं गोष्ट केवळ प्रशंसनीयच नव्हे, तर प्रेक्षणीयही झाली आहे.
‘सलाम’ ही गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडू शकते, घडलेली असतेच. अल्लड बालपण संपून आपण किंचित मोठे झालो, की आपल्याला आजूबाजूचं जग दिसायला लागतं. घर नावाच्या छोटेखानी, सुरक्षित, ऊबदार घरट्यातून आपण जगाच्या उघड्या आकाशात उडायला बघतो, तेव्हा गांगरून, बावरून जायला होतं. घरातल्या मूल्यव्यवस्थेला जग धडका द्यायला लागतं. प्रश्न पडू लागतात. स्पर्धा उभी ठाकते. जगण्यातून तरण्याची आणि तरून टिकण्याची दुर्दम्य इच्छा जन्म घेते. संघर्ष सुरू होतो. पडत-धडपडत-लढत ही अपरिहार्य लढाई आपण लढू लागतो... अशा वेळी आपल्या माता-पित्यांनी आपल्यावर केलेले संस्कारच बळ देतात. उभं राहायला मदत करतात. ‘सलाम’चे नायक रघू आणि सदा यांच्या आयुष्यातही हीच वेळ आली आहे. त्यातही गोष्टीचा फोकस रघूच्या जगण्यावर अधिक आहे. रघूच्या डोळ्यांतूनच आपण ही सगळी गोष्ट पाहतो. सातवीत असलेला रघू (विवेक चाबूकस्वार) आणि त्याचा मित्र सदा (अभिषेक भराटे) यांचं मौजे पारगाव हे गाव पोलिस आणि लष्करातल्या लोकांचं. घरटी एक तरी माणूस पोलिसांत किंवा लष्करात आहेच. रघूचे वडील शंकर पालकर (गिरीश कुलकर्णी) मुंबई पोलिसांत असतात, तर सदाचे वडील लष्करात जवान. रघू आणि सदाच्या मित्रांचा एक ग्रुप आहे. त्यांच्यात सदैव पोलिसांपेक्षा मिलिटरी कशी भारी, याची चर्चा रंगलेली असते. रघूच्या मनात कायम आपल्याच वडिलांच्या पेशाविषयी न्यूनगंड भरलेला असतो. एकदा त्याचे वडील सुट्टीत घरी येतात. रघू त्यांना आपल्या शंका विचारतो. तेव्हा, कुठलाही पेशा लहान किंवा मोठा (भारी) नसतो, अशी समजूत त्याचे वडील काढतात. त्यानंतर रघूच्या शाळेत मुख्याध्यापक चौखुरे (किशोर कदम) गरजू विद्यार्थ्यांसाठी एक जनाधार निधी गोळा करण्याचा कार्यक्रम जाहीर करतात. रघू आणि सदा दोघेही हिरिरीनं या कामाला लागतात. मात्र, काही कारणांनी त्यांच्यात ‘स्पर्धा’ निर्माण होते. पुढं आणखी एका गंभीर प्रसंगानं सर्वच गोष्टीला कलाटणी मिळते... रघू आणि सदाच्या मैत्रीची परीक्षा पाहिली जाते... त्यात नक्की काय होतं, हे पडद्यावरच पाहणं इष्ट.
‘सलाम’मधून आपल्याला नक्की काय सांगायचंय, हे दिग्दर्शकाच्या डोक्यात स्पष्ट आहे. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठेही प्रचारकी न होता, तो आपल्याला या हरवत चाललेल्या मूल्यांची आठवण करून देतो. गाव, निसर्ग, तिथली साधी-भोळी माणसं यांच्या माध्यमातून तो आपले मुद्दे ठसवत राहतो. अशा प्रकारची हाताळणी आपण माजिदी किंवा अन्य इराणी दिग्दर्शकांच्या सिनेमांतून पाहिली आहे. अर्थात ‘सलाम’ला खास गावरान मराठी वातावरणाचा आणि मराठी मातीचा स्पर्श आहेच! याशिवाय किरणचे संवाद थेट भिडणारे असतात. तेही आपल्या रोजच्या जगण्यातूनच आलेले असल्यानं अधिक जिवंत, अधिक खरे वाटतात.
सदा आणि रघूच्या पात्रांसोबतच गिरीश कुलकर्णीने रंगवलेले रघूचे वडील म्हणजे या सिनेमाचे सूत्रधार म्हणायला हवेत. (दिग्दर्शकानं ‘प्रिन्सिपल रोल’ असा नेमका शब्द वापरला आहे.) गिरीशच्या वडिलांच्या तोंडी त्यांच्या जगण्याची सर्व मूल्यव्यवस्था येते. गिरीशनं ही छोटीशीच, पण अत्यंत महत्त्वाची भूमिका फार सुंदर केली आहे. त्यात त्यानं प्राण ओतल्यानं सर्व सिनेमा तोलून धरणारी ‘बॅकबोन’ अशी ही भूमिका ठरली आहे. याशिवाय नंदप्पा (शशांक शेंडे) हे पात्रही असंच सूचक आहे. गावापासून अलिप्त राहणारा, पण सर्वांवर लक्ष ठेवणारा हा नंदप्पा म्हणजे आपल्या बदलत चाललेल्या संस्कृतीचा मूक निषेध करणाऱ्या मोठ्या समुदायाचं प्रतीकच वाटतो. याशिवाय यातील पोस्टमन, मुख्याध्यापक, नाटकाची तालीम घेणारे सर किंवा जनाई किंवा बबन किंवा मधूकाका अशा छोट्या छोट्या व्यक्तिरेखांनाही दिग्दर्शकानं पुरेशी स्पेस देऊन, त्या प्रेक्षकांच्या मनावर व्यवस्थित ठसविल्या आहेत.
विवेक चाबूकस्वार या छोट्या नायकाचं तर करावं तेवढं कौतुक कमीच. त्यानं रघूच्या भूमिकेत खूप समज दाखवली आहे. या वयातल्या मुलांचं संभ्रमित जगणं, नंतर एकदा उद्दिष्ट सापडल्यावर जिद्दीनं त्यात उडी घेणं हे सगळं त्यानं अचूक पकडलं आहे. अभिषेक आणि अन्य मुलांनीही छान कामं करून त्याला चांगली साथ दिली आहे. ज्योती चांदेकर आणि अतिशा नाईक यांनीही आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत. संजय खापरे, किशोर कदम, प्रवीण तरडे यांनीही आपापल्या कामांत मजा आणली आहे. राहुल रानडेंचं संगीत आणि विशेषतः पार्श्वसंगीत या गोष्टीतल्या मोक्याच्या आणि महत्त्वाच्या जागा फार छान अधोरेखित करतं. अभिजित अब्देच्या कॅमेऱ्यानं गावातला निसर्ग आणि तिथलं स्वच्छ, नितळ जीवन सुंदर टिपलंय.
तेव्हा, कृत्रिम, बनावट जगण्याचे मुखवटे फेकून आपला आतला निर्मळ, झऱ्यासारखा स्वच्छ चेहरा पाहायला आणि या शोधाबद्दल दिग्दर्शकाला सलाम करायला ‘सलाम’ पाहायलाच हवा.
---
निर्माता : डॉ. गौरव सोमाणी
कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शक : किरण यज्ञोपवीत
संगीत व पार्श्वसंगीत : राहुल रानडे
सिनेमॅटोग्राफी : अभिजित अब्दे
प्रमुख भूमिका : विवेक चाबूकस्वार, गिरीश कुलकर्णी, अतिशा नाईक, ज्योती चांदेकर, संजय खापरे, किशोर कदम इ.
कालावधी : एक तास ५७ मिनिटे
दर्जा - *** १/२
---
(पूर्वप्रसिद्धी - मटा, पुणे - ३ मे २०१४)
---