16 Nov 2022

रोहन मैफल - ‘पेन’गोष्टी - भाग ५ व ६

भाग ५
--------

वऱ्हाड निघालंय उदगीरला...
-----------------------------------


उदयगिरीचा कवतिकगंधित ‘धूप’ तुला दाविला...
स्वीकारावी माफी आता, न येता या संमेलनाला...

कुठूनसं हे गाणं ऐकू येऊ लागलं आणि अस्मादिकांची अगदी समाधी लागली. गार पाण्याचे हबकारे तोंडावर बसल्यावर लक्षात आलं, की हे स्वप्नातलं गाणं आहे. जाग आली तर कुमार गंधर्व आपलं ‘मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला...’ गात होते. तरीही त्यातल्या ‘धूप’मुळं हिंदीतल्या ‘धूप’ची आठवण आली आणि तेवढ्या सकाळीही घाम फुटला. मग लक्षात आलं, आपण स्वप्नात उदगीरला जाऊन आलो. कशासाठी हा प्रश्नच उद्भवत नाही - साहित्य संमेलनासाठीच!
बघा ना! वैशाखासम भासणाऱ्या आणि भाजणाऱ्या, चैत्रातल्या रणरणत्या उन्हात मराठवाड्याच्या दक्षिणेस, तेलंगण व कर्नाटकाच्या हद्दीत उदयगिरी, अर्थात उदगीर नगरीत मराठी सारस्वतांचा मेळा भरतो आहे. येत्या वीकान्तास तीन दिवस मराठी साहित्य संमेलनाचा नुसता गल्बला माजणार आहे. आमचे ‘साहित्यसुलतान’ कवतिकराव ठाले पाटलांच्या मराठवाडी आग्रहामुळं अखेर हे संमेलन मराठवाड्याच्या, म्हणजेच संतांच्या पवित्र भूमीत घेण्याचं ठरलं. मार्च किंवा एप्रिलमध्ये हे संमेलन होणार म्हणजे होणारच, असं ठाले पाटलांनी एवढ्या निक्षून सांगितलं, की शेजारच्या तेलंगण व कर्नाटक या राज्यांनीही घाबरून तिकडंही मराठी साहित्य संमेलनांचा फड लावलाय, म्हणे! आमच्या कवतिकरावांचं थोडंसं ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’मधल्या बबन्यासारखं आहे. तो कसं, ‘विंग्रजीत पत्र लिहायचं म्हणजे जे मनामंदी येईल ते ठोकून द्यायचं दनादना... हाय काय...’ या तत्त्वाला जागून सगळ्या गोष्टी फाडफाड करत असतो, तसं आमचे कवतिकरावही कुणाचीही अजिबात भीडभाड न बाळगता, ‘जे मनामंदी येईल ते’ फाडफाड बोलून टाकत असतात.
ते काहीही असलं, तरी साहित्य संमेलन हा प्रकार आपल्याला आवडतो. आता उदगीरला जायला जमेल की नाही, हे काही माहिती नाही. मात्र, ग्रामीण महाराष्ट्रात होणारी सगळीच्या सगळी संमेलनं तुडुंब गर्दीची आणि यशस्वी झाली आहेत, यात शंका नाही. अर्थात नगर, परभणी, सातारा, परळी इथल्या संमेलनांच्या वेळी बडे बडे साहित्यिकही हजेरी लावायला होते. आता तेवढं मोठं नाव असलेले साहित्यिकच उरलेले नाहीत, असं वाटू लागलंय. म्हणजे बघा, नगरच्या संमेलनात साक्षात विंदा करंदीकर साध्या झब्बा-पायजम्यात आणि खांद्याला शबनम लावून ग्रंथदिंडीत चाललेले बघितले आहेत. त्यामानानं गेल्या २५ वर्षांत साहित्य संमेलनांचे अध्यक्ष आणि तेथे येणारे लोकप्रिय साहित्यिक यांचं प्रमाण घटतच गेलेलं दिसतंय. ते डोंबिवलीतलं ‘अक्षय’ संमेलन तर अगदीच पडलं होतं. त्याआधी पिंपरीत झालेलं ‘पीडीपी’ संमेलन मात्र जोरदार झालं होतं. करोनाकाळानंतर अगदी आत्ता, डिसेंबरात नाशिकमध्ये झालेल्या संमेलनातही  साहित्यप्रेमींचा उत्साह परतून आल्याचं दिसलं होतं. त्याच उत्साहाच्या जोरावर कवतिकरावांनी उदगीरच्या या ‘हॉट’ संमेलनाचा घाट घातलेला दिसतो.
हे संमेलन आमच्या ना. य. डोळे सरांच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात रंगणार आहे, हे ऐकून आनंद जाहला. बाकी एवढ्या उन्हात तिथं जायचं कसं, या विचारानं महाराष्ट्रदेशीच्या अनेक बिऱ्हाडांतल्या ‘व्यंकटभाऊजी’ आणि ‘वहिनीं’मध्ये ‘काय हुईल, कस्सं हुईल...’ असे विचार डोक्यात ‘बुंगा’यला सुरुवात झालीय, अशी वार्ता कानी आहे. उदगीरमध्ये राहायची व्यवस्था काय, पाण्याचं काय, काही लोक लातूर किंवा नांदेडमध्ये राहणार अशी चर्चा आहे त्यात आपलं तर नाव नसेल ना, अशा एक ना दोन अनेक शंकांचा भुंगा बहुतेकांच्या डोक्यात पिंगा घालू लागला आहे. संमेलनाध्यक्ष मा. भारतराव सासणे सरांची अवस्था ‘काशिनाथ’सारखी झाली असणार, याविषयी आपल्या मनात मुळीच शंका नाही. एवढं सगळं संमेलनाचं वऱ्हाड त्यांनाच घेऊन जायचंय. त्यात संमेलनाचे ‘जानराव’ हे थेट राष्ट्रपतीच असल्यानं या संमेलनात खऱ्या अर्थानं ‘जान’ आली आहे, हे नाकारून चालणार नाही. कवतिकरावांचा उत्साह काही सांगता येत नाही. उदगीरच्या रस्त्यांवर ग्रंथदिंडीत त्यांनी कोत्तापल्ले-सासणे यांना फुगडी घालायला लावतीलच ते! गेली काही वर्षं उद्घाटनाला मा. शरदचंद्रजी पवारसाहेब नसतील, तर तो ‘फाउल’ धरला जातो. त्यामुळं साहेब आहेतच. गोव्याचे ज्ञानपीठ विजेते साहित्यिक दामोदर मावजो हेदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीवरून गोमंतकात वादाच्या गजाली झडायला सुरुवात झालीच आहे. मात्र, काही झालं तरी कवतिकरावांनी मावजोंना ‘आवजो’ म्हणत हिरवा कंदील दिल्यानं ते येणारच आहेत.
संमेलनाची कार्यक्रमपत्रिका आणि त्यातल्या परिसंवादाचे विषय बघितले, तर गेल्या काही वर्षांत बहुतेक वेळा यातले परिसंवाद किंवा त्यातले विषय ऐकून झाले आहेत, हे लक्षात येईलच. दुसऱ्या दिवशी राजन गवस यांची मुलाखत होणार आहे. विनोद शिरसाठ यांच्या ‘साधने’मुळं ती ‘दणकट’ होईल, यात शंका नसावी. तरुण कादंबरीकारांशी संवादाचा एक कार्यक्रम आहे, तो ऐकण्याजोगा वाटतो आहे. त्यात प्रवीण बांदेकर, रमेश इंगळे उत्रादकर, मोनिका गजेंद्रगडकर, आसाराम लोमटे, प्रसाद कुमठेकर आणि युवा साहित्य अकादमी विजेते प्रणव सखदेव यांच्यासोबत गप्पा रंगणार आहेत.
रविवारचा तिसरा दिवस राष्ट्रपतींच्या उपस्थितीमुळे विशेष ठरेल. यापूर्वी सांगलीच्या संमेलनात तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आल्या होत्या. (त्यामुळे मावळते संमेलनाध्यक्ष अरुण साधू यांना भाषणास वेळ न दिल्याने ते सूत्रे प्रदान करण्यासाठी तिथे गेलेच नव्हते. यंदा नारळीकर सरांना न येण्यासाठी हे एक चांगलं कारण आहे खरं!) असोच.
बाकी संमेलन सुरू व्हायच्या आधी दोन दिवस उदगीरमध्ये खरा दणका होईल तो अजय-अतुल यांच्या संगीत रजनीचा. संमेलनाची सुरुवात खऱ्या अर्थानं ‘झिंगाट’ होणार आहे. दुसऱ्या दिवशी एका वाहिनीवरील लोकप्रिय हास्य कार्यक्रमातली ‘नेहमीची यशस्वी’ मंडळी येणार असल्यानं उदगीरमधली त्यांची चाहते मंडळी खूश होतील. बाकी काही नसलं, तरी संमेलन ‘वाजलं’ पाहिजे, यात कुणाच्या मनात शंका नसावी.
हे संमेलन पार पडलं, की मे महिन्यात साहित्य महामंडळाचं कार्यालय मुंबईकडं जाईल. मराठवाड्याचं ‘कवतिक’ संपेल आणि पश्चिम दिशेवर ‘उषा’काल सुरू होईल. तोवर आपण ‘बुंग ऽऽऽ’ म्हणत संमेलनाच्या उत्तरपूजेची वाट बघायची...

(१४ एप्रिल २०२२)

---

भाग ६
--------

उत्सव बहु थोर होत...
--------------------------

उदगीरचे ‘हॉट हॉट’ संमेलन संपले तरी साहित्यजगतातील उत्साह आणि उत्सवाचे वातावरण अजूनही वाफाळते, गरमागरम आहे. शिवाय सध्या पुण्यापासून ते ठाण्यापर्यंत आणि चांद्यापासून ते बांद्यापर्यंत सगळा महाराष्ट्रच वेगवेगळ्या कारणांनी तप्त झाला असल्याने, साहित्य क्षेत्र तरी त्याला कसे अपवाद ठरणार! त्यामुळेच सध्या सगळीकडे पुस्तक प्रकाशनांचे पेंडिंग सोहळे पार पाडताना दिसत आहेत. पुस्तकांची नवनवी दालने सुरू होत आहेत, (काही महत्त्वाची नियतकालिके बंद पडली तरी) नवी मासिके सुरू होत आहेत, पुस्तकांची प्रदर्शने भरत आहेत... असे एकूण ‘उत्सव बहु थोर होत’ पद्धतीचे वातावरण सगळीकडे दिसते आहे.
वास्तविक मे महिना म्हणजे सुट्टीचा महिना. या काळात शाळांना सुट्टी पडली रे पडली, की प्रवासाला निघायचे असा पूर्वीचा खाक्या असायचा. गेली दोन वर्षे कोव्हिडकाळामुळे हे सगळे वेळापत्रक बिनसले. यंदा मात्र सगळी परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसते आहे. त्यामुळेच दोन वर्षांपासून थांबून राहिलेल्या अनेक पुस्तकांचे प्रकाशन दणक्यात होताना दिसत आहे. विशेष म्हणजे पूर्वी पुण्यात पुस्तक प्रकाशनांसाठी काही ठरावीक ठिकाणे असायची. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा माधवराव पटवर्धन हॉल, पत्रकार भवनाचे सभागृह, एस. एम. जोशी सभागृह ही ती ठरलेली ठिकाणे. ही ठिकाणे आजही लोकप्रिय आहेत, यात वाद नाही. शहराच्या मध्यवर्ती भागात आणि सर्वांना यायला-जायला सोयीची अशी ही ठिकाणे आहेत, हे त्या लोकप्रियतेमागचे कारण आहे. अर्थात आता अनेक जण वेगवेगळी, नवी, चांगली ठिकाणे शोधत आहेत. चित्रपटविषयक कार्यक्रमांना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (एनएफएआय) ऑडिटोरियम कायमच लाभत असते. या जोडीला आता गोखले इन्स्टिट्यूटचा ज्ञानवृक्ष आणि परिसर, भांडारकर इन्स्टिट्यूटचे नवे झालेले अँफी थिएटर, कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेत झालेले रमा-पुरुषोत्तम सभागृह व तिथले सुंदर अँफी थिएटर, पी. एन. गाडगीळ समूहातर्फे खडकवासल्याच्या पुढे कुडजे गावात लवकरच सुरू होत असलेले ‘झपूर्झा’ हे कला संकुल, मयूर कॉलनीतील शाकुंतल सभागृह अशा किती तरी नव्या जागांनी पुण्यातील सांस्कृतिक विश्वाला हाकारे घालायला सुरुवात केली आहे. यापैकी काही ठिकाणी तर नियमित सांस्कृतिक कार्यक्रम होतही आहेत. शहरात अशी नवनवी सांस्कृतिक घडामोडींची केंद्रे होत राहणे फार महत्त्वाचे आहे. शहरात असलेली गर्द झाडी, वनराई यांना ‘शहराची फुप्फुसे’ असे म्हटले जाते. या नव्या सांस्कृतिक केंद्रांना ‘शहराच्या मानसिक पोषणाची केंद्रे’ असे म्हटले पाहिजे.
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद यासारख्या मोठ्या शहरांत अशी सांस्कृतिक केंद्रे असतात व तिथे कायम काही ना काही कार्यक्रम होत असतात. त्यामुळे त्या शहरांतील सांस्कृतिक जीवन बहरलेले दिसते. याउलट अवस्था ग्रामीण महाराष्ट्राची आहे. बऱ्याच तालुक्यांच्या ठिकाणी चांगली ग्रंथालये आहेत. मात्र, नवी पुस्तके घ्यायची म्हटले, तर त्यांना शहराचीच वाट धरावी लागते. ऑनलाइन पुस्तकविक्रीच्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्यांच्याकडे आपल्याला हवी ती पुस्तके उपलब्ध असतातच, असे नाही. आता मुंबई व पुण्यातल्या मोठ्या प्रकाशकांनी (त्यात ‘रोहन प्रकाशन’ही अर्थातच आले!) आता स्वत:च्या वेबसाइटवरून थेट पुस्तके ऑलाइन उपलब्ध करून, ग्रामीण वाचकांची मोठीच सोय केली आहे, यात शंका नाही.
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुस्तकांच्या जगात जी हालचाल होते, ती यासाठी महत्त्वाची आहे. किती कोटींची उलाढाल झाली किंवा मागील संमेलनापेक्षा कमी झाली की जास्त, हे मुद्दे महत्त्वाचे असले तरी केवळ तेवढेच मुद्दे महत्त्वाचे नाहीत. ग्रामीण भागात संमेलन झाले, की त्या परिसरातल्या अनेक वाचकांची पुढील वर्ष-दोन वर्षांसाठीची तरी पुस्तकांची भूक मिटते. संमेलनात पुस्तकांच्या दालनांसमोर आजही गर्दी नक्कीच होते. पुढच्या पिढीतील अनेक संभाव्य वाचक तिथे येत असतात. साहित्यिकांना बघत असतात. पुस्तक दालनांमधून हिंडत असतात. त्यांच्यासाठी ही संमेलने म्हणजे एक पेरणी असते. या मुलांनी तिथे यावे, पुस्तके बघावीत, हाताळावीत यासाठी प्रकाशकांपासून ते आयोजकांपर्यंत सारेच उत्सुक असतात. पुढच्या पिढीचा हा प्रतिसाद फार महत्त्वाचा असतो. अनेकदा तर असे वाटते, की अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने यापुढची सर्व संमेलने तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्हा केंद्र असलेल्या, पण तुलनेने लहान शहर असलेल्या ठिकाणीच भरवावीत. मोठ्या शहरांमध्ये साहित्य संमेलनांना मिळणारा प्रतिसाद व या निमशहरी भागांत मिळणारा प्रतिसाद यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. तेव्हा या गोष्टीचा खरोखर विचार व्हायला हवा.
आत्ताच्या काळात पुस्तकांचे महत्त्व खरे तर नव्याने सांगायला नको. सध्या समाजमाध्यमांचा वाढता प्रभाव आपण बघतो आहोत. या माध्यमांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे आपल्या मनावर कब्जा करायला सुरुवात केलीच आहे. आपण नकळत दुसऱ्याच्या इशाऱ्यावर नाचणारे रोबो तर होत नाही ना, अशी भीती अनेकदा मनात येते. अशा वेळी पुस्तकांचा फार आधार वाटतो. पुस्तके न बोलता, आपल्याला बरेच काही शिकवत असतात. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे, आपली विवेकबुद्धी शाबूत ठेवायला मदत करतात. आपली जी काही बरी-वाईट मते असतील, ती तर्काच्या कसोटीवर घासून-पुसून, तावून-सुलाखून घेण्याची संधी देतात. यासाठी पुस्तके हवीत, पुस्तक प्रकाशनेही हवीत आणि त्यासाठीचे उत्सवही हवेत... आपल्याला माणूस म्हणून जरा अधिक उन्नत व्हायचे असेल, तर या उत्सवाला पर्याय नाही!

(१५ मे २०२२)

---



No comments:

Post a Comment